श्री संभाजी बबन गायके

? इंद्रधनुष्य ?

☆ ३७ हजार पांडवांचे गुरु द्रोणाचार्य! ☆ श्री संभाजी बबन गायके 

शिवरायांचा ‘गनिमी कावा’ पुढे चालवणारे ब्रिगेडीअर बसंत पंवर! 

 भारताला पाकिस्तान आणि चीनसोबतची समोरासमोरची थेट युद्धे जंगलात लढावी लागली नाहीत. परंतु नक्षलवादी, माओवादी, विघटनवादी इत्यादी शक्तींशी लढताना मुख्य लढाई घनदाट जंगलातच होती आणि आहे. अर्थात भारतीय जनमानस या संघर्षाला अजूनही लढाई आणि त्यात लढणा-यांना सैनिक मानत नाही, ही दुर्दैवी वस्तुस्थिती आहे. जनमानसात युद्ध म्हणजे आंतरराष्ट्रीय सीमापार प्रचंड हल्ले, मोठी शस्त्रे… लढाई आणि हारजीत! 

 त्यामुळेच आरंभी मुघल शिवरायांच्या मावळ्यांना सैनिक आणि त्यांच्या समूहाला सैन्य मानत नव्हते… पुढे शिवरायांच्या गनिमी काव्याने मुघलांच्या साम्राज्याची राखरांगोळी केली, हा इतिहास आहे. छत्रपती महाराज साहेबांनी विकसित करून प्रचंड यशस्वी करून दाखवलेला हा गनिमी कावा म्हणजेच Guerrailla warfare!

 जंगलात लढण्यासाठी विशिष्ट पद्धतीची युद्धनीती अवलंबावी लागते. Guerra म्हणजे लढाई आणि illa म्हणजे छोटी… लहान! guerrailla म्हणजे लहान लढाई… चकमक! 

 ही युद्धनीती आरंभी भारतीय सैनिकांना आरंभी तितकीशी अवगत नव्हती आणि ही नीती शिकवण्याची कोणती व्यवस्था. ही कमतरता भरून काढली ती ब्रिगेडीअर बसंत पनवर साहेबांनी. साहेब त्यांच्या आई-वडिलांचे एकुलते एक अपत्य. त्यांचे वडील मेजर देवीसिंग पनवार दुस-या महायुद्धात सहभागी होते. तर आजोबा म्हणजे आईचे वडील कर्नल मंगल सिंग हेही पहिल्या महायुद्धात सैनिकी अधिकारी होते. मामा कर्नल अजित सिंग, लेफ्ट. कर्नल ओंकार सिंग, मेजर रामसिंग हेही सैन्याधिकारीच होते!

 साहेबांना अगदी शालेय वयापासून घोडेस्वारीची आवड होती. आपण एक घोडा विकत घ्यावा, असं त्यांना कायम वाटे. आणि पुढील आयुष्यात त्यांनी खरोखरीच एक घोडा विकत घेतलाही. घोड्यावरून खेळले जाणारे अनेक साहसी खेळ साहेब लीलया खेळत असत! 

 साहेबांच्या वडिलांची बदली होई त्या शहरात साहेबांचे शिक्षण होत गेले… पण कळत्या वयात त्यांना पुण्याच्या बिशप्स स्कूल बोर्डिंगमध्ये राहण्याची संधी प्राप्त झाली.. ज्या ठिकाणी ब्रिटीश आर्मीमधील शिक्षकांचे मार्गदर्शन लाभले. खेळांमध्ये प्रगती साधता आली. पुढे साहेब वडिलांकडे आग्रह करून सैनिकी शाळेत आणि तिथून पुढे एन. डी. ए. खडकवासला येथे प्रवेश घेते झाले. ते एन. डी. ए. मध्ये जिमनास्टीक्स, घोडेस्वारी या प्रकारांत अव्वल होते. त्यामुळे एन. डी. ए. चा अभ्यासक्रम आणि पुढे आय. एम. ए. चाही अभ्यासक्रम सहजी पूर्ण झाला!

मेरीटमध्ये उत्तीर्ण झाल्याने साहेबांना कुठल्या पलटणमध्ये जायचे हे ठरवण्याची विशेष सवलत मिळाली आणि त्यांनी त्यांच्या वडिलांनी ज्या पलटणीमध्ये कारकीर्द घडवली होती त्या फर्स्ट मराठा पलटणीत प्रवेश मिळवला! ही पलटण जंगी पलटण म्हणजे लढाऊ पलटण म्हणून ख्यातकीर्त आहे. साहेबांना पहिली नेमणूक मिळाली ती Nagaland मध्ये.

३, सप्टेंबर, १९७०. पंवर साहेबांनी यंग ऑफिसर्स नुकताच पूर्ण केला होता. नागा बंडखोरांनी त्यावेळी तिथे प्रचंड उच्छाद मांडला होता, सैनिकांना कोंडीत पकडून त्यांचा अनन्वित छळ केला होता. आणि याच ठिकाणी पंवर साहेब दाखल झाले होते.

इथे नागा बंडखोर अतिरेक्यांनी भारतीय सैन्याला मुद्दाम त्यांच्या एका प्रशिक्षण शिबिराची माहिती मिळेल अशी व्यवस्था केली… जेणेकरून एकाच वेळी अनेक सैनिक त्यांच्या तावडीत सापडू शकतील!

 त्यावेळी तरुण तडफदार सेकंड लेफ्टनंट पदावर असलेल्या पंवर साहेबांनी या छावणीवर त्यांच्या अगदी जवळ जात हल्ला चढवला. बंडखोर पळून आत जंगलात जाऊन लपले. आपल्या सैनिकांनी त्यांचा पाठलाग केला, प्रशिक्षित श्वानांची मदत घेतली… त्यामुळे नागा बंडखोरांच्या मनात भारतीय फौजेविषयी धाक निर्माण झाला! 

 पुढे १९७१ मध्ये पाकिस्तानशी घोषित युद्ध सुरु होण्याआधी साहेबांनी सीमापार घुसत, स्थानिक मुक्ती वाहिनीच्या सदस्यांना हाताशी धरून पाकिस्तानी फौजेवर डोन मोठे छुपे हल्ले चढवले आणि यशस्वी करून दाखवले… पुढे होणार असलेल्या युद्धाची ही एक चुणूकच म्हणावी लागेल… पंवर साहेबांचा आत्मविश्वास एका वेगळ्याच उंचीवर पोहोचला होता. इतका का ते मोहिमेवर जाताना चक्क स्वत:चा कॅमेरा घेऊन जात आणि फोटो घेत.

 आपल्याला या वयातच युद्धावर जाण्याची संधी मिळणार आहे, याचा त्यांना खूप अभिमान वाटला होता! अशा अनेक चकमकी सुरु झाल्या. अशाच एका संघर्षात आपल्या सैनिकांनी २३४ पाकिस्तानी सैनिकांना यमसदनी धाडले… आणि त्यामुळे त्यांचे उर्वरीत सैन्य त्यांच्या कमांडरसह ढाक्यामध्ये पलायन करते झाले! याचवेळी मुक्ती वाहिनीच्या सैनिकांची आणि आपल्या सैनिकांची भेट झाली.. त्यांनी विचारले… दुश्मन किधर है? पंवर साहेब म्हणाले… दुश्मन भाग रहा है! पाकिस्तानने शरणागती पत्करली आणि मग पंवर साहेबांना थोडी उसंत मिळाली… तोवर ते कॅप्टन पदी पोहोचले होते. पण लगेचच एक महत्त्वाची जबाबदारी दिली गेली… ऑफिसर्स ट्रेनिंग अकॅडमी, मद्रास येथे प्रशिक्षक नेमले गेले… इतरांपेक्षा साहेबांचा अनुभव चार-पाच वर्षांनी कमी असला, त्यांचे प्रशिक्षणार्थी त्यांच्यापेक्षा वयाने मोठे असले तरी साहेबांनी त्यांच्या दर्जेदार प्रशिक्षण, स्वत: उदाहरण बनून दाखवल्याने त्यांचा कार्यकाल खूप यशस्वी झाला! घोडेस्वारी करता करता खेळला जाणारा अतिशय रोमांचक आणि अवघड खेळ, पोलो या खेळामध्ये कॅप्टन साहेबांना खास गती होती.. त्यांना दिल्लीत बोलावून घेण्यात आले. राष्ट्रपती भवनातल्या घोडदळ दलामध्ये त्यांची व्यवस्था करण्यात आली. पुढे देशाच्या अनेक भागांत, अनेक जबाबदा-या पार पाडत पाडत साहेब त्रिपुरा मध्ये आसाम रायफल्समध्ये आले.

त्या भागात भारतविरोधी कारवाया खूप मोठ्या प्रमाणात सुरु होत्या. साहेबांनी बंडखोरांना सक्त ताकीद दिली… भारतीय सेनेविरोधात तुम्ही कधीही यशस्वी होऊ शकणार नाही… हत्यारे खाली ठेवा! 

पुढे Nagaland, मिझोरम मध्ये साहेबांनी उत्तम काम करून दाखवले. मिझोरममधल्या जोराम्थांगा सरकारशी त्यांनी बोलणी केली. जोराम्थांगा हे मुख्यमंत्री होते, जे पूर्वाश्रमीचे सशस्त्र आणि भूमिगत बंडखोर होते. आणि त्यांनी guerrilla युद्धनीतीने भारतीय सैन्याशी संघर्ष केला होता… सुमारे वीस वर्षे. ते पुढे राष्ट्रीय प्रवाहात सामील झाले व राजकरणात येऊन मुख्यमंत्री बनले. पंवर साहेबांनी याच जोराम्थांगा यांना भारतीय सेनेने स्थापन केलेल्या अतिरेकी विरोधी कारवायांना कसे तोंड द्यायचे यासाठी स्थापन केलेल्या सैन्य शैक्षणिक संस्थेत ‘गनिमी कावा’ युद्ध अर्थात guerrilla युद्ध कसे करावे? या विषयावर व्याख्यान द्यायला येण्याचे आमंत्रण देण्याचे धाडस दाखवले होते! 

 पंवर साहेबांनी त्यांचे हे युद्धकौशल्य पुढे अमेरिकन सैन्यातील काही सैनिकांनाही शिकवले… त्यावर त्यांच्या संरक्षणमंत्र्यां प्रशंसोद्गार काढले होते. पुढे भारत-अमेरिका संयुक्त सैन्य सरावात guerrilla warfare आणि पंवर साहेब हे एक समीकरण बनले होते.

 पुढे २००४ वर्ष उजाडले आणि पंवर साहेबांच्या हातून एक मोठे कार्य पार पडण्याचे दिवस आले… नक्षलवाद विरोधी अभियान! साहेबांना छत्तीसगढमध्ये आमंत्रित करण्यात आले. पोलिसांना जंगलात नक्षली बंडखोरांशी नेमके कसे लढावे याचे प्रशिक्षण फारसे नव्हते. साहेबांनी सुरुवातीला १०० पोलिस आणि पुढे आणखी काही पोलिस अधिका-यांना प्रशिक्षित केले. साहेबांच्या सेवानिवृत्तीला त्यावेळी केवळ दोन महिने उरले होते. छत्तीसगढ सरकारने पंवर साहेबांना पोलिसांना प्रशिक्षण देण्याची विनंती केली. त्यावेळी खरंतर साहेबांना कांगो या आफ्रिकी देशात जाण्याची इच्छा होती… पण भारतातही तसेच जंगल आहे आणि आपली इथे खूप गरज आहे, हे त्यांना विनंतीपूर्वक सांगण्यात आले आणि साहेबांच्या आणि नक्षलवाद विरोधी चळवळीला एक नवे वळण प्राप्त झाले… जे खूप महत्त्वाचे ठरले! 

३१ मार्च, २००५ रोजी भारतीय सैन्यातून साहेब निवृत्त झाले… कुटुंबियांना घरी सोडले आणि आणि साहेब रायपूर साठी रवानाही झाले… इन्स्पेक्टर जनरल ऑफ पोलिस या पदाची सूत्रे हाती घेतली! आणि त्यांनी पहिला आदेश काढला… नक्षलवाद्यांशी लढायचे ते सैनिकी वेशात… खाकी रंगाचा गणवेश नको… combat uniform वापरायचा! यामुळे पोलिसांच्या आत्मविश्वासाला मोठी झळाळी आली.

मग साहेबांनी प्रशिक्षणासाठी विशेष जागा पाहिजे म्हणून आग्रह धरला. तीन मोठ्या डोंगरांच्या मध्ये असलेली जागा निवडली. जणू ही प्रत्यक्ष युद्धभूमीच होती. नक्षली ज्या वातावरणात राहतात… तसे वातावरण तयार करून घेतले… ते जसे हल्ले चढवतात, तसेच हल्ले आपणही करायचे… एवढेच नव्हे जंगलात सैनिकांसाठी शौचालये किती आकाराची बांधायची, तयार करायची याची मोजमापे ठरवून दिली. आरंभी केवळ शंभर एक एकर जमीन मिळाली होती या कामासाठी… ती विविध प्रयत्न करून तीनशे एकरांवर नेली. वनखात्याची जमीन वापरात आणली. त्यासाठी प्रशासकीय पातळीवर संघर्षही केला. विशेष helipad बांधून घेतले… विशिष्ट रुंदीचा रस्ताही बांधून घेतला… या रस्त्याला ELG नाव दिले. याचा full form कित्येक लोकांना लवकर समजला नाही… emergency landing ground! ज्याचा पुढे अनेकांना उपयोग झाला. जखमी सैनिकांना वेगाने रुग्णालयात नेता येऊ लागले. परिसरात ८५ हजार झाडे लावली… जंगल आणखी घनदाट केले. साडेचार महिन्यात जंगल युद्ध प्रशिक्षण केंद्र सुरु झाले. हे भारतातील पहिले प्रशिक्षण केंद्र होते… गनिमी कावा शिकवणारे! 

 प्रशिक्षण अतिशय कडक. कुणी सलग तीन दिवस अनुपस्थित राहिले की त्याने संपूर्ण अभ्यासक्रम पहिल्यापासून पुन्हा करायचा असा दंडक घालून दिला! शारीरिक व्यायाम तर होताच, पण मानसशास्त्रीय कसोट्यासुद्धा घेतल्या गेल्या… स्वत:वर नियंत्रण कसे आणावे, रागावर काबू कसा ठेवावा, कठीण परिस्थितीत निर्णय कसे घ्यायचे याचे वस्तुपाठ घालून दिले साहेबांनी. त्यामध्ये त्यांचा स्वत:चा प्रदीर्घ अनुभव त्यांच्या शब्दांना धार आणत होता.

 या प्रशिक्षणातून तयार झालेल्या सर्वांना पोलिस ते सैनिक असा बदल अनुभवाला येऊ लागला. अतिरेक्यांसोबत चकमकी तर होतच होत्या, पण त्यात पोलिसांची हानी लक्षणीयरीत्या कमी होऊ लागली, बहादुरी गाजवणा-या पोलिसांना पदके प्रदान केली जाऊ लागली. या भागात नेमणूक म्हणजे शिक्षा हा समज हळूहळू कमी होऊ लागला.

 पंवर साहेबांनी मार्गदर्शन करावे अशी विनंती मग झारखंड, पश्चिम बंगाल, बिहार इत्यादी दहा राज्यांनी केली.. साहेबांच्या मार्गदर्शनात त्यांनी आपापल्या पद्धती विकसित केल्या. पूर्वी नक्षली अतिरेकाविरोधात भारतीय सैन्य बोलवावे, त्यांची मदत घ्यावी अशी मागणी होत असे. आता सैन्यासारखीच क्षमता पोलिसांमध्येही ब-याच प्रमाणात आल्याने तशी फारशी वेळ आली नाही… पोलिसांचे रुपांतर सैनिकांत होऊ लागले होते… पंवर साहेब या कार्यात थोडीथोडकी नव्हेत… अठरा वर्षे सक्रीय राहिले! सैन्यातील प्रत्यक्ष सेवा आणि नंतरची ही सेवा मिळून साहेबांनी किमान पन्नास वर्षे देशसेवा बजावली. यावर्षी नक्षलवादी सशस्त्र संघर्ष जवळपास संपुष्टात आल्याची चिन्हे आहेत… येत्या काळात सर्वच नक्षलवादी मुख्य राष्ट्रीय प्रवाहात सामील होतील.. अशी आशा आहे. पण ही प्रक्रिया कित्येक वर्षांपूर्वी सुरु झाली होती… त्यात ब्रिगेडीअर बसंत पंवर (पन्वर) या महान योध्याच्या कार्यकुशलतेचा, नियोजन, नेतृत्व आणि मुख्य देशसेवेच्या अपार इच्छाशक्तीचा सिंहाचा वाटा होता… हे काळाला मान्यच करावे लागेल! 

आपल्याकडे महान माणसांची महती त्यांच्या मृत्यूनंतरच सामान्य लोकांना समजते… ब्रिगेडीअर साहेबांचेही काही निराळे झाले नाही… १ फेब्रुवारी, २०२३ रोजी साहेबांनी या दीर्घ सेवेतून निवृत्ती घेतली… कारण मिशन पूर्ण झाले होते! शरीराला आरामाची आवश्यकता होतीच… शिवाय कुटुंब आता वाट पहात होते… २०११ मध्ये अर्धांगिनी स्वर्गवासी झाल्या होत्या. दोन सुपुत्र तर सेनेत अधिकारी बनून सीमेवर सेवा करीत होतेच. त्यामुळे तेही फारसे घरी नसत. पण आई वाट पहात होती. त्या बिचारीने ७१ च्या लढाईतून आपला पोर सहीसलामत परत यावा यासाठी देवाला साकडे घातले असेल… पोरगं लढत राहिले पुढची कित्येक वर्षे. साहेबांनी २०२३ मध्ये २७ फेब्रुवारीला अत्यंत वृद्ध झालेल्या आईच्या गळ्यात हार घातला… आणि चरणस्पर्श केला! आई… मी घरी आलो आहे… सुरक्षित! 

 साहेबांना विशिष्ट सेवा मेडल तर मिळाले होतेच… पुढे अति विशिष्ट सेवा मेडलही तत्कालीन राष्ट्रपती डॉक्टर अब्दुल कलाम साहेबांच्या हस्ते दिले गेले… त्याही वयात साहेबांनी उत्कृष्ट परेड चाल म्हणजे विशिष्ट सैनिकी पद्धतीने चालत जात राष्ट्रपती महोदयांना अभिवादन केले होते! 

७७ वर्षे, ४ महिने आणि २४ दिवसांच्या देदीप्यमान आयुष्यानंतर २७ जुलै, २०२६ रोजी ब्रिगेडीअर बसंत पंवर साहेबांनी या जगाचा निरोप घेतला… हाती घेतलेलं कार्य तडीस नेले… असे सैन्याधिकारी देशाला लाभले हे आपले मोठेच सुदैव. साहेबांना करावे तेवढे अभिवादन कमीच पडेल! Maratha Light Infantry मधून सैनिकी जीवन सुरु करणा-या या महान सैनिकाने बोल छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय! हा जयजयकार खरा करून दाखवत शिवरायांची युद्धनीती जगून दाखवली आणि 37 हजार जवानांना शिकवली सुद्धा! Fight a guerrilla like a guerrilla पोलिसांतून कमांडो निर्माण करणारे ब्रिगेडीअर पंवर साहेब आपले भूषण आहेत. जय हिंद.

© श्री संभाजी बबन गायके 

पुणे

9881298260

≈ संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares
0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted