श्री मेघ:श्याम सोनावणे
🌸 जीवनरंग 🌸
☆ तिकीट प्रवासाचं.. एका आशेचं… लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – श्री मेघ:श्याम सोनावणे ☆
रेल्वे स्टेशनवर दररोज एक वृद्ध व्यक्ती एकच तिकीट खरेदी करायची… पण कधीच ट्रेनमध्ये बसायची नाही. २५ वर्षांनंतर त्याचे कारण समजले.
सकाळचे ठीक ७ वाजून १० मिनिटे झाले होते. स्टेशनवर चहावाल्यांचा आवाज, हमालांची धावपळ, शिट्टीचा आवाज आणि याच गर्दीत पांढरा कुर्ता-पायजमा घातलेला एक वृद्ध माणूस तिकीट खिडकीवर सर्वात आधी उभा असायचा. “एक सिंगल तिकीट… शिवपूरपर्यंत. “
क्लर्क तिकीट द्यायचा, वृद्ध माणूस खिशातून पैसे काढायचा, तिकीट अशा प्रकारे हातात धरायचा जणू ती कोणती मौल्यवान ठेव आहे…
त्यानंतर प्लॅटफॉर्म नंबर दोनच्या सर्वात शेवटच्या बाकावर जाऊन बसायचा. ट्रेन यायची… दरवाजे उघडायचे… लोक चढायचे- उतरायचे… पण तो कधीच ट्रेनमध्ये बसायचा नाही. ट्रेन निघून जायची… तो तिकीट हळूच आपल्या खिशात ठेवायचा आणि शांतपणे घरी परतायचा.
हा घटनाक्रम एक-दोन दिवस नाही… पूर्ण पंचवीस वर्षे सुरू होता. स्टेशनच्या प्रत्येक कर्मचाऱ्याने त्याला पाहिले होते. लोक त्याची थट्टा उडवायचे. ‘बाबांचे डोके फिरले आहे असे वाटते, ‘ कोणीतरी म्हणायचे, ‘एवढ्या पैशांत महिनाभराचे रेशन आले असते. ‘ पण त्याने कधीच कोणाला उत्तर दिले नाही.
मग एक दिवस स्टेशन मास्टर बदलून नवीन अधिकारी आला. त्याचे नाव होते निखिल. पहिल्याच आठवड्यात त्याने त्या वृद्धाला पाहिले. दुसऱ्या दिवशी पुन्हा पाहिले. तिसऱ्या दिवशीही तेच. आता त्याच्याने राहवले नाही. ट्रेन निघून गेल्यावर तो त्या वृद्धाजवळ जाऊन बसला. “बाबा… जर वाईट वाटणार नसेल, तर एक गोष्ट विचारू? “
वृद्ध हसले. “विचार बेटा. “
“तुम्ही रोज तिकीट खरेदी करता… पण कधीच जात नाही. का? “
वृद्ध काही क्षण शांत राहिले. त्यांचे डोळे प्लॅटफॉर्मच्या रुळांवर स्थिरावले. मग त्यांनी खिशातून जुन्या तिकिटांचे एक बंडल काढले. इतके जाड की हाताची मूठ भरून जावी. “यात प्रत्येक दिवसाचा हिशोब आहे… “
निखिल थक्क झाला. “पण कसला हिशोब? “
वृद्धांनी दीर्घ श्वास घेतला. “आजपासून पंचवीस वर्षांपूर्वी… याच प्लॅटफॉर्मवर माझा दहा वर्षांचा मुलगा रोहन माझ्यापासून दुरावला. त्या दिवशी स्टेशनवर खूप गर्दी होती. त्याने म्हटले होते- ‘बाबा, तुम्ही तिकीट घेऊन या… मी इथे बाकावर बसलो आहे. ‘
मी पाच मिनिटांत परतलो… बाक रिकामे होते. पूर्ण स्टेशनवर शोधले. पोलीस आले. अनाउन्समेंट झाली. वृत्तपत्रांत फोटो छापले गेले. पण माझा मुलगा… कुठेच सापडला नाही. “
वृद्धांचा आवाज थरथरू लागला. “त्या दिवशी जाताना त्याने मला एक गोष्ट सांगितली होती- ‘बाबा… जर मी कुठे हरवलो… तर तुम्ही मला घ्यायला नक्की या. ‘
निखिलचे डोळे पाणावले.
वृद्धांनी तिकीट छातीशी धरले. “बस बेटा… त्याच दिवशी मी स्वतःला वचन दिले की, मी रोज तिकीट खरेदी करेन… जेणेकरून जर माझा रोहन कधी परत आला… तर त्याला वाटावे की त्याचे बाबा आजही त्याला घ्यायला आले आहेत. मला असे वाटते की एक दिवस तो परत येईल… आणि मी तेव्हा तिथे नसेल असे होऊ नये. “
पूर्ण प्लॅटफॉर्म जणू काही काळासाठी थांबला होता. दुसऱ्या दिवशी निखिलने स्टेशनचे जुने रेकॉर्ड्स तपासले. धुळीने भरलेल्या फाईल्स… पिवळे पडलेले कागद… एक बेपत्ता झाल्याची तक्रार. एक अंधूक फोटो. आणि खाली लिहिले होते- ‘रोहन… वय १० वर्षे. ‘
निखिलने तो फोटो सोशल मीडियावर शेअर केला. त्याला स्वतःलाही अपेक्षा नव्हती की काही होईल. पण तीन दिवसांनंतर… स्टेशनच्या कंट्रोल रूममध्ये एक फोन आला. “काय… त्या मुलाचे वडील अजून जिवंत आहेत? “
फोन करणारा माणूस स्वतः पंचावन्न वर्षांचा होता. त्याने सांगितले, “फोटोतील मुलगा माझ्याकडे आहे. ”
मग रोहने फोन घेऊन थरथरत्या आवाजात म्हटले – “माझ्या हातावर लहानपणापासून भाजल्याची एक खूण आहे… आणि मला फक्त इतकेच आठवते की, मी माझ्या बाबांना ‘बाबूजी’ म्हणायचो… आणि रेल्वे स्टेशनवर हरवलो होतो. “
डीएनए टेस्ट झाली. रिपोर्ट आला. आणि सत्य समोर होते. तो खरोखरच रोहन होता.
ज्या दिवशी दोघांची भेट झाली… संपूर्ण स्टेशन पाहण्यासाठी जमा झाले होते. रोहन हळूहळू वृद्धासमोर पोहोचला. दोघे एकमेकांकडे पाहत राहिले. पंचवीस वर्षे… डोळ्याचे पाते लवते न लवते तोच जणू परत आले. रोहन ढसाढसा रडू लागला. “बाबूजी… माफ करा… मी तुम्हाला शोधू शकलो नाही. “
वृद्धांनी त्याला मिठीत घेतले. “वेड्या… चूक तुझी नव्हती… मला माहित होते… तू नक्की येशील. म्हणूनच मी रोज तिकीट घेऊन तुझी वाट पाहत होतो. “
रोहने थरथरत्या आवाजात विचारले- “बाबूजी… ती सर्व तिकिटे कुठे आहेत? “
वृद्ध हसले. “घरी एक लोखंडी पेटी आहे… त्यात तुझ्या प्रतीक्षेची पंचवीस वर्षे ठेवली आहेत. “
काही महिन्यांनंतर वृद्धाचा मृत्यू झाला. रोहने ती पेटी उघडली. आत हजारो तिकिटे नीटनेटकी ठेवलेली होती. सर्वात वर एक चिठ्ठी होती. त्यावर लिहिले होते- “जर तू ही चिठ्ठी वाचत आहेस… तर समजून घे की तू परत आला आहेस. आता मला काहीही दुःख नाही. बेटा, मी तिकीट कधी प्रवासासाठी खरेदी केले नाही… मी ती आशा जिवंत ठेवण्यासाठी खरेदी केली होती.
लक्षात ठेव… जगात सर्वात लांब प्रवास रेल्वेचा नसतो, तर कोणाची तरी वाट पाहण्याचा असतो. “
त्या दिवशी रोहने ती सर्व तिकिटे आपल्या वडिलांच्या चितेसोबत जाळली नाहीत… तर स्टेशनवर एका काचेच्या फ्रेममध्ये लावली. खाली फक्त एक ओळ लिहिली होती- ‘काही लोक मजल गाठण्यासाठी तिकीट खरेदी करतात… आणि काही लोक आपल्या नात्यांना जिवंत ठेवण्यासाठी. ‘
त्या फ्रेमसमोरून जाणारा प्रत्येक प्रवासी काही क्षण थांबतो… आणि न समजता आपले डोळे पुसून पुढे निघून जातो…
**
लेखक : अज्ञात.
प्रस्तुती : श्री मेघ:श्याम सोनावणे
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈






