मराठी साहित्य – विविधा ☆ दिल, दोस्ती आणि रियुनियन… ☆ सुश्री संगीता कुलकर्णी ☆

सुश्री संगीता कुलकर्णी

? विविधा ?

☆ दिल, दोस्ती आणि रियुनियन ☆ सुश्री संगीता कुलकर्णी ☆

आयुष्य हे एका प्रवाही नदीसारखे असते.. ती नदी वाहत राहते, किनारे बदलत राहतात, प्रवासी बदलतात पण काही दगड तिच्या तळाशी कायमचे विसावलेले असतात. मैत्रीही अशीच असते. काळ कितीही पुढे सरकला, आयुष्याने कितीही नवी वळणे घेतली, तरी मनाच्या तळाशी जपलेल्या मित्रांच्या आठवणी कधीच पुसल्या जात नाहीत. आणि जेव्हा अनेक वर्षांनी मित्र पुन्हा एकत्र येतात तेव्हा तो केवळ रियुनियन नसतो तो हरवलेल्या दिवसांना पुन्हा एकदा कवेत घेण्याचा भावनिक उत्सव असतो…

शाळेच्या त्या वर्गात एकाच बाकावर बसलेली मने आज जगाच्या वेगवेगळ्या दिशांना विखुरलेली असतात. कुणी यशाच्या शिखरावर पोहोचलेला असतो, कुणी संघर्षाच्या वाटेवर चालत असतो तर कुणी संसाराच्या जबाबदाऱ्यांत स्वतःला विसरून गेलेला असतो पण रियुनियनच्या दिवशी या सगळ्या ओळखी मागे पडतात. पुन्हा एकदा तेच खट्याळ चेहरे, तेच निरागस हसू आणि तेच बेधडक मन समोर उभे राहते. काळाने चेहऱ्यावर सुरकुत्या उमटवल्या असतील, केसांवर पांढरेपणा चढवला असेल पण मैत्रीच्या आठवणी मात्र अजूनही तारुण्याने उजळलेल्या असतात… शाळेच्या अंगणात एकत्र खेळलेले खेळ, डब्यातील घास वाटून खाल्लेले दिवस, शिक्षकांच्या रागानंतरही ओठांवर उमटलेले खट्याळ हास्य, परीक्षेच्या आदल्या दिवशी केलेला अभ्यास आणि सुट्टीची घंटा वाजताच दप्तर खांद्यावर टाकून धावणारी पावले हे सारे क्षण काळाच्या पडद्याआड गेलेले असतात मात्र रियुनियनच्या निमित्ताने ते पुन्हा नव्याने जिवंत होतात. प्रत्येक चेहऱ्यावर काळाच्या रेषा उमटलेल्या असतात पण डोळ्यांतील निरागस मैत्री तशीच ताजी असते…

मैत्री म्हणजे अपेक्षारहित विश्वास. न सांगताही मनातील वेदना समजून घेणारे डोळे, अपयशात खांद्यावर ठेवलेला आधाराचा हात आणि यशात मनापासून वाजवलेली टाळी

यालाच तर मैत्री म्हणतात… रक्ताच्या नात्यांपेक्षाही अनेकदा मैत्रीचे नाते अधिक जवळचे वाटते कारण ते स्वार्थाने नव्हे तर मनाने जोडलेले असते… मैत्री ही रक्ताच्या नात्यापेक्षाही अधिक जिव्हाळ्याची असते. या नात्याला स्वार्थाचा स्पर्श नसतो, अपेक्षांचे ओझे नसते. मित्रांच्या सहवासात माणूस स्वतःला विसरून मनमोकळेपणाने हसतो. जीवनातील यश-अपयश, आनंद-दुःख, संघर्ष आणि स्वप्ने यांची देवाणघेवाण करताना जाणवते की वर्षांचे अंतर मैत्रीची उब कमी करू शकत नाही…

रियुनियनमध्ये जुन्या आठवणींची पाने एकामागून एक उलगडत जातात. वर्गात केलेल्या खोड्या, डबा चोरून खाण्याचे प्रसंग, शिक्षकांची बोलणी, वार्षिक स्नेहसंमेलनातील गोंधळ, परीक्षेच्या आदल्या रात्री केलेली अभ्यासाची धडपड

प्रत्येक आठवण हसवते तर काही आठवणी डोळ्यांत नकळत पाणी आणतात.. त्या क्षणी काळ थबकतो आणि आयुष्य पुन्हा एकदा बालपणाच्या उंबरठ्यावर येऊन उभे राहते.

आजच्या यांत्रिक जगात माणूस मोबाईलच्या संपर्कात आहे पण मनांच्या संपर्कापासून दूर जात आहे.. हजारो संदेशांची देवाणघेवाण होते तरीही मन मोकळे करून हसण्यासाठी माणूस शोधावा लागतो म्हणूनच रियुनियन ही केवळ भेट नसते ती नात्यांना पुन्हा जिवंत करणारी ऊब असते. मित्रांच्या हास्यात दडलेला आनंद आणि त्यांच्या मिठीत मिळणारा दिलासा कोणत्याही संपत्तीपेक्षा मोठा असतो… आजच्या डिजिटल युगात संदेश आणि व्हिडिओ कॉल सहज उपलब्ध आहेत पण समोरासमोर भेटून हातात हात घेण्याची, खांद्यावर हात ठेवून हसण्याची आणि डोळ्यांत डोळे घालून आठवणींना उजाळा देण्याची ऊब कोणतेही तंत्रज्ञान देऊ शकत नाही. म्हणूनच रियुनियन हा केवळ कार्यक्रम नसतो तो नात्यांना पुन्हा नव्याने जगवणारा उत्सव असतो…. खरे तर जीवनाच्या प्रवासात पद, पैसा आणि प्रतिष्ठा मिळवता येते पण बालपणीची निरागस मैत्री विकत घेता येत नाही. ती फक्त जपावी लागते. रियुनियन हा त्या जपलेल्या नात्यांचा उत्सव असतो. तो आपल्याला शिकवतो की आयुष्य कितीही व्यस्त झाले तरी मनासाठी काही माणसे राखून ठेवली पाहिजेत कारण शेवटी यशाच्या शिखरावर उभे राहिल्यावर टाळ्या वाजवणारे अनेक मिळतील पण पडल्यावर हात धरून उभे करणारे मित्रच असतात म्हणूनच ‘दिल, दोस्ती आणि रियुनियन’ हे तीन शब्द नसून आयुष्याचा हळवा, जिवंत आणि अमूल्य अनुभव आहे. काळाच्या ओघात सर्व काही बदलते पण मैत्रीचे धागे मात्र काळालाही तोडता येत नाहीत म्हणूनच मनाच्या प्रत्येक कोपऱ्यात एक हाक कायम घुमत राहते

“मित्रांनो, पुन्हा भेटूया… कारण आठवणींना नव्याने जगण्यासाठी रियुनियनची एक भेटच पुरेशी असते. “

रियुनियन हा त्या मैत्रीच्या झऱ्याला पुन्हा एकदा उगम देणारा क्षण असतो. म्हणूनच आयुष्याच्या संध्याकाळी मागे वळून पाहताना जर काही सर्वाधिक मौल्यवान वाटत असेल, तर ते म्हणजे

मित्र, त्यांच्या आठवणी आणि पुन्हा एकदा त्यांना भेटण्याचा तो अविस्मरणीय रियुनियन…!

शेवटी असे वाटते की, ‘दिल, दोस्ती आणि रियुनियन’ ही तीन शब्दांची गोष्ट नसून आयुष्यभर जपण्यासारखी अमूल्य ठेव आहे…

©  सुश्री संगीता कुलकर्णी 

लेखिका /कवयित्री

ठाणे मो. 9870451020

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ वाढदिवस… – भाग – १ ☆ श्री दीपक तांबोळी ☆

श्री दीपक तांबोळी

? जीवनरंग ?

☆ वाढदिवस… – भाग – १ ☆ श्री दीपक तांबोळी

लोढा शेठच्या गाडीचा हाॅर्न वाजला तसा एकनाथच्या ऐवजी दिनू सिक्युरिटीच्या रुममधून बाहेर आला. त्याने लगबगीनं फाटक उघडलं. गाडी जशी गेटच्या बाहेर पडू लागली तसा त्याने आपला बाप जसा ठोकतो तसा सॅल्यूट लोढाशेठला पाहून ठोकला. लोढाशेठच्या चेहऱ्यावर त्याला बघून एक प्रसन्न हास्य झळकलं. “पोरगा खरंच स्मार्ट आहे”ते मनातल्या मनात म्हणाले. गाडी पुढे रस्त्याला लागली तसा कालचा प्रसंग त्यांना आठवला. काल त्यांच्या मुलाचा पंधरावा वाढदिवस त्यांनी सोसायटीच्या क्लबहाऊसमध्ये जोरदार साजरा केला. त्यांचा मुलगा सनी दहावीच्या परीक्षेत ९९%घेऊन पास झाला होता हे खरं वाढदिवस साजरा करण्यामागचं मुख्य कारण होतं. सोसायटीचा सिक्युरिटी गार्ड कम केयरटेकर एकनाथचा मुलगा दिनू वाढदिवसाला आपल्या आईबहिणीसोबत हजर होता. लोढाशेठ सगळ्या पाहुण्यांची चौकशी करतकरत दिनूजवळ पोहचले. दिनू त्यांचाच नाही तर पुर्ण सोसायटीचा आवडता मुलगा. त्याला पाहून लोढाशेठ थांबले. त्याच्या उत्साहाने भरलेल्या चेहऱ्याकडे पहात त्यांनी विचारलं

“काय दिनू कशी वाटली पार्टी? “

“लई झकास ” दिनूनं त्याच्या नेहमीच्या स्टाईलने उत्तर दिलं “पुढच्या महिन्यात माझा पण वाढदिवस आहे आणि माझे पप्पा पण अशीच सगळ्यांना पार्टी देणार आहेत “

ते ऐकून लोढाशेठ जोरात हसले. या पार्टीकरता त्यांना दिड लाख खर्च आला होता. एक सिक्युरिटी गार्ड एवढा खर्च करणं शक्यच नव्हतं. एकनाथने त्याला नको ते स्वप्न दाखवलं होतं. दिनूच्या भाबडेपणाची त्यांना गंमत वाटली पण त्यांना त्याचं मन मोडायचं नव्हतं म्हणून ते म्हणाले

“अरे वा!आम्हांला बोलावणार आहे ना? “

“हो मग!सोसायटीतल्या सगळ्यांना बोलावणार आहे” दिनू उत्साहाने म्हणाला.

शेठजी हसतहसतच पुढे गेले होते.

ते आठवून आताही शेठजींच्या चेहऱ्यावर हसू उमटलं. एकदम त्यांना जाणवलं की एकनाथची एवढा खर्च करण्याची ऐपत नक्कीच नाही. महिन्याला दहा हजार कमावणारा माणूस एकदिड लाख फक्त वाढदिवसाला खर्च करणार नाही. मात्र सोसायटीत रहाणारे सगळे मिळून तर करु शकतात. या विचाराने त्यांना एकदम उत्साह वाटायला लागला. काय हरकत आहे? प्रत्येकाने दोन हजार जरी जमा केले तरी दिनूचा वाढदिवस जोरदार साजरा करता येणार होता आणि सोसायटीतला कुणी नाही म्हणेल असंही त्यांना वाटत नव्हतं कारण सगळेच पैसेवाले होते आणि महत्वाचं म्हणजे दिनू होताच तसा. सदोदित उत्साहाने फसफसलेला. हाक मारली की कुणाच्याही मदतीला धावून जाणारा. कोणतंही काम सांगा दिनूने ते केलं नाही असं नाही. बरं या कामाचा कुणी मोबदला देईल अशीही अपेक्षा नाही. तो शाळेतून आला की सारखा सोसायटीतल्या रहिवाशांच्या कामासाठी वरखाली करायचा. कधी कंटाळा नाही की नाही म्हणणं नाही. “दिनू मला भाजी आणून दे” “दिनू जरा रुम साफ करायचीय. येतोस का मदतीला? ” “दिनू आजीला जरा फिरवून आणतोस का बागेत? ” “दिनू कोपऱ्यावरच्या मेडिकल मधून औषधं आणून दे बरं” “दिनू बाळ रडतोय. त्याला फिरवून आण जरा” अशी शेकडो कामं रोजच दिनूला सांगितली जायची आणि दिनू ती उत्साहाने करायचा. कधी कुणी त्याच्यावर चिडलं, रागावलं तरी दिनूने कधीही उलटून उत्तर दिलंय असं होत नव्हतं.

 सोसायटीला तीन सिक्युरिटी गार्ड होते. त्यातले दोन गावातच रहायचे. एकनाथ मराठवाड्यातल्या परभणी जिल्ह्यातून आलेला. एक्स सर्व्हिसमॅन. सोसायटीच्या अगोदरच्या अध्यक्षांनी त्याला आणलं होतं. सोसायटीच्या बेसमेंटमध्ये बांधलेल्या दोन छोट्या रुममध्ये कुटुंबासह रहायचा. सिक्युरिटी गार्ड कम केअर टेकर अशा दोन्ही भुमिका तो निभवायचा. दिनू हा त्याचा छोटा मुलगा. तेरा वर्षाचा. गोरागोमटा आणि चुणचुणीत. एकनाथची बायको आणि मोठी मुलगीही सोसायटीतल्या रहिवाशांची गरज पडली तर बऱ्याचदा धुण्याभांड्याची कामं करायची. एकंदरीत या पुर्णच कुटुंबाची सोसायटीला बरीच मदत व्हायची पण खरा हिरो होता तो दिनू. सर्वांच्या मदतीला ताबडतोब धावून जाणारा.

 लोढाशेठ सोसायटीचे सेक्रेटरी होते. त्यांनी ठरवलं सोसायटीच्या मेंबर्सची मिटिंग बोलवायची आणि हा मुद्दा मांडायचा. बारा मजली सोसायटीत ४८ फ्लॅट होते आणि त्यात रहाणारे जवळजवळ सगळेच सधन होते. दोनतीन हजार काढून द्यायला कुणी नाही म्हणणार नव्हतं.

रात्री ते घरी परतले तेव्हा एकनाथ ड्युटीवर होता. त्याला त्यांनी विचारलं

“एकनाथ आपल्या दिनूचा वाढदिवस कधी असतो? “

“सोळा ऑक्टोबर. का बरं साहेब? “

“अरे काल तो म्हणत होता माझे पप्पा पण माझा वाढदिवस सनीसारखाच साजरा करणार आहेत. खरंय का? “

एकनाथ जोरात हसला

“अहो साहेब आपली काय ऐपत असा वाढदिवस साजरा करण्याची. पण काल सनीबाबाचा वाढदिवस पाहून तो माझ्या मागे लागला की माझाही वाढदिवस असाच करायचा. मी त्याला खुप समजावून सांगायचा प्रयत्न केला पण ऐकेचना म्हणून म्हंटलं ठिक आहे करु. तर तो सगळ्यांना तेच सांगत सुटलाय. अर्थात त्याच्यावर कोण विश्वास ठेवायलाय? “

“आम्ही करु त्याचा वाढदिवस “असं सांगायचं शेठजींच्या अगदी ओठावर आलं होतं पण दिनूला सरप्राईज द्यायला पाहिजे या विचाराने ते काही बोलले नाहीत.

जेवण वगैरे झाल्यावर त्यांनी सोसायटीच्या अध्यक्षांना फोन लावला.

“पाटिल साहेब, एक विचार मनात आलाय. आपला सिक्युरिटी गार्ड एकनाथचा मुलगा दिनूचा पुढच्या महिन्यात वाढदिवस आहे. तुम्हांला तर माहितच आहे की दिनू किती कामाचा मुलगा आहे ते. तेव्हा मला असं वाटतं की आपण सगळ्या सोसायटीने मिळून त्याचा वाढदिवस साजरा करावा”

“कल्पना चांगली आहे. पण साजरा करायचा म्हणजे कसा? “

“सोसायटीतल्या प्रत्येक परीवाराने दोन हजार जमा करायचे. साधारण शहाण्णव हजार जमतील. त्यात केक कापणं, सगळ्यांचं जेवण आणि मनोरंजनात्मक कार्यक्रम आयोजित करु. त्या निमित्ताने एक गेटटुगेदर होऊन जाईल”

“गेटटुगेदर ठिक आहे पण एका सिक्युरिटी गार्डच्या मुलाचा वाढदिवस साजरा करणं आपल्यासारख्या उच्चभ्रू लोकांना शोभेल का? सोसायटित असे अनेक जण आहेत ज्यांना आपल्या मुलांचे वाढदिवससुद्धा घरातच साजरे केलेले आवडतात मग दिनूच्या वाढदिवसाला ते तयार होतील का? अजून एक प्राॅब्लेम आहे. हा वाढदिवस आपण आपल्या खर्चाने साजरा केला तर बाकीचे सिक्युरिटी गार्ड म्हणतील आमच्या मुलांनी काय घोडं मारलंय? दिनूचा केला तर आमच्याही मुलांचे करा. मग तेव्हा काय उत्तर द्यायचं? “

“अहो साहेब त्यांची फॅमिली इथं रहात नाही. सिक्युरिटी शिवाय इतर कोणतंही काम ते किंवा त्यांची फॅमिली करत नाही. शिवाय तुम्ही पहाता तो पोरगा शाळेतून आला की सोसायटीतल्या लोकांची वैयक्तीक कामं करत असतो तीही फुकट. कधी त्याने कामाचे पैसे मागितले नाहीत की कामाला नाही म्हंटलं नाही. सोसायटीतले लोक त्याला आपल्या स्वार्थाकरीता वापरुन घेतात. मग एक दिवस त्याच्या साठी खर्च केला तर बिघडलं कुठं? “

“ठिक आहे. माझी काही हरकत नाही. ठेवा मिटिंग. बोलावून घ्या सगळ्यांना. पण मला नाही वाटत लोक तयार होतील. एकेक नमुने आहेत सगळे”

” पण मला खात्री आहे, दिनूसाठी ते नक्कीच पैसे देतील. आणि त्यांनी नाही दिले तरी मी एकटा करेन त्याचा वाढदिवस “लोढाशेठ जिद्दीने बोलून गेले

“मग तर प्राॅब्लेमच नाही. व्हा पुढे”

 सोसायटीतल्या सगळ्या परीवारांचा एक व्हाॅटस्अप ग्रुप होता. त्यावर शेठजींनी येत्या रवीवारी पाच वाजता मिटिंग आयोजित केल्याचा मेसेज टाकला. मिटिंगचा विषय त्यांनी मुद्दामच टाकला नाही. विषय पाहूनच बरेच जण मिटिंगला यायचेच नाहीत असं त्यांना व्हायला नको होतं.

रविवार उजाडला. लोढाशेठ पाच वाजताच मिटिंग हाॅलमध्ये जाऊन बसले. कुणीही आलं नव्हतं. हे नेहमीचंच होतं. कोणत्याही विषयावर मिटिंग असो येणारे फार कमी. जे यायचे तेही आपल्या फुरसतीने सेक्रेटरीवर उपकार केल्यासारखे डुलतडालत यायचे.

सहा वाजले तेव्हा अध्यक्ष पाटील उगवले.

“अरे!अजून कुणीच आलं नाही? तुम्ही मेसेज पाठवला होता ना सगळ्यांना? “त्यांनी विचारलं

” हो तर. एकूणएक जणाला मेसेज पाठवलाय”

“मग असं कसं झालं? मेसेज ऐवजी तुम्ही फोनच करायला हवे होते. मेसेज वाचलाच नसेल तर त्यांना कळणार कसं? “

“अहो साहेब सगळ्यांनी मेसेज वाचलाय. मी चेक केलंय”

तेवढ्यात तीन चार जण आले. मग परत तीनचार जण आले. शेवटी सव्वासहा वाजता बारा जणांची उपस्थिती झाली. विषय जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहचावा म्हणून लोढाशेठनी दहापंधरा मिनिटं थांबायचं ठरवलं.

” लोढा शेठ मिटिंगचा विषय नाही कळवला तुम्ही” लोखंडे जरा रागातच म्हणाले

“साहेब ही ऑफिशियल मिटिंग नाहिये. पण एक पाच मिनिट थांबा सगळा विषय क्लियर होईल “

” शेठजी लवकर आटोपा. आम्हांला शाॅपिंगला जायचंय” गव्हाणे मावशी घाई करत म्हंटल्या.

शेवटी आहे ती मंडळीही निघून जाऊ नये म्हणून शेठजींनी सुरुवात केली.

“माननीय सदस्यांचं मी स्वागत करतो. आज सोसायटीच्या प्रश्नांव्यतिरिक्त एका वेगळ्याच विषयावर चर्चा करण्याकरीता आपण जमलो आहोत. विषय असा आहे की आपण सर्वच जण आपल्या सिक्युरिटी गार्ड एकनाथचा मुलगा दिनेश उर्फ दिनूला जाणता. एक सगळ्यांच्या मदतीला धावून जाणारा, कसलीही अपेक्षा न करता सगळ्यांची काम चोख करणारा, सदोदित हसतमुख असणारा असा हा मुलगा आपल्या सर्वांचाच लाडका आहे. या दिनूचा वाढदिवस सोळा ऑक्टोबरला आहे. माझा असा विचार आहे की दिनूच्या या कामाबद्दल, त्याच्या आपल्या सर्वांना असलेल्या सहकार्याबद्दल यावेळेचा त्याचा वाढदिवस आपण सर्वांनी मिळून साजरा करावा”

शेठ थांबले. त्यांनी कुणी काही प्रतिक्रिया देतंय का याचा अंदाज घेतला. दोन मिनिट शांतता पसरली मग कुलकर्णी म्हणाले

“खरंच दिनू आपली खुपच काम करतो. आपण त्याचा वाढदिवस साजरा केला तर त्याला, त्याच्या आईवडिलांना खुप आनंद होईल. पण वाढदिवस साजरा कसा करणार? “

” सोपं आहे. आपण सर्वांनी दोन हजार रुपये जमा करायचे. ४८ घरांचे ९६ हजार जमा होतील. त्यात केक, दिनूला गिफ्ट, सगळ्या परीवारांचं एकत्र जेवण आणि मनोरंजनाचा हल्काफुल्का कार्यक्रम करता येईल “

“बापरे दोन हजार? खुप जास्त होतात “सुलक्षणेबाई म्हणाल्या.

” अहो मॅडम आपण हाॅटेलमध्ये जातो तेव्हा आपल्या चारपाच जणांचंच बिल तीनचार हजार होतं. ते आपण भरतोच ना? “शेठजी कळवळून म्हणाले

” पण काहो शेठजी, दिनू आपल्यासाठी जे काही करतो त्याचा काही ना काही मोबदला आपण देतोच ना!परवा त्याने माझ्या बाईकचं पंक्चर जोडून आणलं तेव्हा मी त्याला दहा रुपये खुशीने दिलेच होते. मग वेगळा वाढदिवस साजरा करायची गरज काय? ” महाजन मध्येच उठून म्हणाले.

” हो बरोबर आहे ” पवारांनी त्यांची री ओढली “आम्हीसुद्धा त्याने गहू वगैरे दळून आणले की खुशीने पाचदहा रुपये देतोच. आणि शेठजी या लोकांचे असे वाढदिवस साजरे करुन त्यांना मातवू नका. आज तुम्ही दिनूचा वाढदिवस साजरा करताय उद्या त्याच्या बहिणीचा करावा लागेल. मग दुसरे सिक्युरिटी गार्ड म्हणतील आमच्याही मुलांचे करा. मग प्रत्येक वेळी आम्ही असेच दोन दोन हजार द्यायचे का? “

शेठजींना शंका आली की पवार दारु पिऊनच आले असावेत कारण आताही त्यांचे डोळेही तारवटलेले होते. पवार सरकारी अधिकारी होते. दाबून वरकमाई करत होते आणि खर्चही तसाच करायचे. प्यायला बसले की पाचपाच हजाराची दारु ते पिऊन जातात असं शेठजींच्या कानावर आलं होतं. आणि आता एका चांगल्या कामासाठी दोन हजार द्यायला खळखळ करत होते

– क्रमशः भाग पहिला 

© श्री दीपक तांबोळी

जळगांव

मो – 9209763049

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) –  उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित / मंजुषा मुळे/ गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ फ्रेंडशिप डे – – लेख क्र. ३ ☆ श्री सुधीर करंदीकर ☆

श्री सुधीर करंदीकर

? मनमंजुषेतून ?

☆ फ्रेंडशिप डे – – लेख क्र. ३ ☆ श्री सुधीर करंदीकर

त्या दिवशी फ्रेंडशिप डे असल्यामुळे भरपूर मित्रांबरोबर शुभेच्छांची देवाण-घेवाण झाली. काही मित्र-मैत्रिणींबरोबर गप्पा पण झाल्या.

… तुमचे पण मेसेजेस आणि गप्पा नक्कीच झाले असतील.

काल सकाळी नात तन्वी हिचा फोन आला : “ हॅपी फ्रेंडशिप डे. ” 

मी पण तिला हॅपी फ्रेंडशिप डे म्हणालो.

मी : अगं आज फ्रेंडशिप डे आहे, ग्रँड फादर डे नाही.

तन्वी : आबा माहिती आहे. ग्रँड फादर च्या आधी यु आर माय बेस्ट फ्रेंड. तुम्ही माझ्याशी नेहमी मस्त गप्पा मारता. समजावून सांगता. म्हणून यु आर माय फ्रेंड.

… या संवादावर मी सहज विचार केला आणि लक्षात आलं की आजोबा आणि नात या नात्याला मित्र मित्र ही पण जोड दिली तर जास्तच मजा येईल.

आपण घराच्या बाहेर पडल्यानंतर आपल्या मागे अनेक विशेषणे लावून, स्टेटस लावून वावरत असतो. माझा धर्म, माझी जात, पोटजात वगैरे वगैरे ओळख लावून आपण आपसांमध्ये दुरावा निर्माण करत असतो. घराबाहेर खरंतर फक्त स्वतःचे नाव आणि सगळ्यांचा मित्र एवढीच आपली ओळख असावी.

घरामध्ये असताना नवरा, बायको, आई, वडील वगैरे विशेषणे आपल्या मागे असतात, त्यामुळे आपला अधिकार जागृत होतो. असं करू नका, तसं करू नका, असे आपले उपदेश सुरू होतात.

वयस्कर आई-वडिलांना मुलं असं करू नका, तसं करू नका, असे बजावत असतात. वयस्कर वडील मुलांना/ नातवंडांना सारखे सल्ले देत असतात. नवरा बायको यांच्यामध्ये पण हीच भाषा असते. पुढे त्याचे रूपांतर वादावादी आणि घरामध्ये ताण तणाव यामध्ये होते. घरातले संवाद, हसणं खिदळणं हे सगळचं लोप पावतं. आणि सगळे फेसबूक आणि व्हाट्सअप ला आपला कृत्रिम मित्र करतात. आणि यांचा अतिरेक तब्येती करता कसा त्रासदायक ठरतो हे आपण बघतोच

… म्हणून नातं या विशेषणातून बाहेर काढणारा सोपा मार्ग म्हणजे, आपल्या नात्याच्या बरोबर मित्र हा शब्द सोडायचा….. नवरा मित्र, बायको मित्र, सासु मित्र वगैरे.

… घरची जबाबदारी पार पडताना मी बायको करता नवरा असणार आणि इतर वेळा मित्र असणार.

… घरामध्ये वयस्कर वडील आहेत त्यांची जबाबदारी पार पाडताना मी त्यांचा मुलगा असणार, इतर वेळेला त्यांचा मित्र असणार.

आपण सगळ्यांनीच जर हा विचार अमलात आणला, तर “आनंदी आनंद गडे जिकडे तिकडे चोहीकडे” असेच छान वातावरण घरात आणि बाहेर नेहमीच राहणार हे नक्की.

© श्री सुधीर करंदीकर

मो. 9225631100 – ईमेल – srkarandikar@gmail. com

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ पिशव्यांची पिशवी!… – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – गौरी गाडेकर ☆

गौरी गाडेकर

? मनमंजुषेतून ?

☆ पिशव्यांची पिशवी!… – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – गौरी गाडेकर

मध्यमवर्गीय महाराष्ट्रीय घराची काही वैशिष्ट्यं असतात – – – 

.. डब्याला झाकण सापडत नाही, पण झाकण मात्र फेकायचं नसतं.

.. घरात कुठेतरी एक डबा असतो, ज्यात स्क्रू, खिळे, रबरबँड, जुन्या चाव्या आणि कशाचे आहेत हे देवाला ठाऊक असलेले दोन प्लास्टिकचे पार्ट असतात.

आणि स्वयंपाकघराच्या दारामागे असते— पिशव्यांची पिशवी!

तिचा जन्म कधी झाला हे घरात कुणालाच माहीत नसतं.

…… भाजीची पिशवी आली—आत.

मेडिकलची आली—आत.

कपड्यांच्या दुकानातून जरा जाड पिशवी मिळाली की तिचं प्रमोशन—

“ही ठेव हं. चांगली आहे!”

आता आपल्या घरात ‘चांगली पिशवी’ ही फार व्यापक संकल्पना आहे. जिला भोक नाही, ती चांगली!

कधीतरी पिशव्यांची पिशवी इतकी फुगते की दारामागून बाहेर डोकावू लागते.

…. मग घरातला एखादा धाडसी माणूस प्रश्न विचारतो,

“एवढ्या पिशव्या कशाला हव्यात? ”

त्यावर उत्तर येतं,

“तुला काय त्रास होतोय? राहू दे. कधी तरी लागतील!”

मध्यमवर्गीय संसारात ‘कधी तरी’ या दोन शब्दांनी जेवढी जागा व्यापली आहे, तेवढी बहुधा फर्निचरनेही नाही.

दहा वर्षांपूर्वीच्या मोबाईलचा चार्जर आहे. मोबाईल गेला, कंपनी गेली, कदाचित तो चार्जिंग पोर्टसुद्धा इतिहासजमा झाला—पण चार्जर आहे.

दिवाळीत आलेल्या मिठाईचा सुंदर डबा आहे. त्यात मिठाई नाही. सध्या काहीच नाही. पण डबा फेकायचा नाही… कारण? “चांगला आहे!”

आणि एक शर्ट आहे. तो सध्या बसत नाही.

पण त्याला फेकण्याचा प्रश्नच नाही.

“पाच किलो कमी झालं की होईल!”

तो शर्ट कपडा नसतो. तो आशावादाचा पुरावा असतो!

मला कधीकधी वाटतं, आपण वस्तू साठवतच नाही.

आपण ‘कधी तरी’ साठवत असतो.

.. कधी तरी लागेल.

.. कधी तरी उपयोग होईल.

.. कधी तरी वेळ मिळेल.

.. कधी तरी मी पुन्हा तसा होईन.

आणि मग एक दिवस जाणवतं—

आपल्या मनातसुद्धा अशीच एक पिशव्यांची पिशवी आहे.

.. दहा वर्षांपूर्वी कुणीतरी केलेला अपमान अजून आहे.

.. पाच वर्षांपूर्वीचं कौतुकही आहे.

.. एक निर्णय चुकीचा घेतला होता, तो आहे, त्याचं गिल्ट आहे.

.. कुणीतरी आपल्याशी कसं वागायला हवं होतं, त्याची अपेक्षा आहे.

.. आणि त्या भांडणात समोरच्याला द्यायचं राहून गेलेलं भन्नाट उत्तर तर अगदी व्यवस्थित जपून ठेवलंय!

…. कशासाठी?

.. बहुधा…“कधी तरी लागेल!”

भगवद्गीतेत श्रीकृष्ण म्हणतात—

विहाय कामान्यः सर्वान् पुमांश्चरति निःस्पृहः ।

निर्ममो निरहङ्कारः स शान्तिमधिगच्छति ॥

“माझं’ म्हणून प्रत्येक गोष्ट घट्ट धरून ठेवण्याची गरज ज्याला उरत नाही, तोच शांततेकडे जातो.

गीता घरातल्या पिशव्या फेकायला सांगत नाही.

…. ती कदाचित मनातल्या पिशव्या तपासायला सांगते.

कारण कपाटातल्या पिशव्यांनी फार तर जागा अडते.

…. मनातल्या पिशव्यांनी आयुष्यच अडतं.

…. जुना अपमान, जुना अहंकार, जुनं यश, जुनी चूक, जुनी अपेक्षा—सगळंच ‘कधी तरी लागेल’ म्हणून जपून ठेवलं, तर नवीन अनुभव ठेवायचे कुठे?

कदाचित अपरिग्रह म्हणजे घर रिकामं करणं नव्हे. तर कालचं किती उद्यापर्यंत वाहून न्यायचं, हे ठरवता येणं.

.. त्यामुळे पुढच्या वेळी पिशव्यांची पिशवी खाली उतरवून आवरायला घेतली, तर एक पिशवी आणखी उघडून पाहूया.

.. मनातली पिशवी |

…. उपयोगाचं असेल ते ठेवू… शिकण्यासारखं असेल तेही ठेवू.

बाकीचं?

सरळ टाकून देऊ.

…… कारण प्रत्येक गोष्टीला—

“कधी तरी लागेल!”.. असं म्हणत राहिलो, तर एक दिवस *आज* ठेवायलाच जागा उरणार नाही.

लेखक:अज्ञात

प्रस्तुती: गौरी गाडेकर

संपर्क – 1/602, कैरव, जी. ई. लिंक्स, राम मंदिर रोड, गोरेगाव (पश्चिम), मुंबई 400104.

फोन नं. 9820206306

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ पर्यावरणाचे सदिच्छादूत : दिलीप आणि डॉ. सौ. पौर्णिमा कुलकर्णी- भाग – २ ☆ श्री विश्वास देशपांडे ☆

श्री विश्वास देशपांडे

? इंद्रधनुष्य ?

पर्यावरणाचे सदिच्छादूत : दिलीप आणि डॉ. सौ. पौर्णिमा कुलकर्णी– भाग – २ ☆ श्री विश्वास देशपांडे ☆

(आपण शहरात राहूनही पर्यावरणस्नेही जीवन जगण्याचा प्रयत्न करू शकतो. आपल्या गरजा आणि उपभोगवादी प्रवृत्ती आपल्याला कमी आली पाहिजे. प्लास्टिक, कागद इ सारख्या वस्तूंचा अनावश्यक वापर टाळला पाहिजे. पाणी जपून वापरले पाहिजे.)  इथून पुढे – – 

ते आपल्याला चार R सांगतात. पहिला R म्हणजे ज्या गोष्टी पर्यावरणाच्या दृष्टीने घातक आहेत, ज्यांचे लवकर विघटन होत नाही, अशा वस्तुंना refuse करा म्हणजेच नाही म्हणा. जर ते शक्य नसेल तर दुसरा R म्हणजे reduce म्हणजे त्या वस्तूचा कमीतकमी वापर करा. तिसरा R म्हणजे reuse. त्या वस्तूंचा पुनर्वापर करा. आणि चौथा R म्हणजे recycle. म्हणजे त्या वस्तूंचा वापर पुनर्निर्माणासाठी करा. उदा. कागदाची रद्दी रद्दीवाल्याकडेच द्या जेणेकरून त्यापासून नवीन कागद निर्मिती होईल. अधिक वृक्षतोड करावी लागणार नाही.

दिलीपदादा आणि पौर्णिमाताई ज्याला आपण लाल डबा म्हणून हिणवतो त्या लाल बसनेच प्रवास करतात. जवळ जायचं असेल तर शक्यतो पायीच जातात. त्यापेक्षा जास्त अंतर असेल तर सायकल वापरतात. लांबच्या अंतरासाठी लाल बसचा वापर करतात. ए सी तर नाहीच नाही. बसच्या प्रवासात काढलेलं तिकीट सुद्धा ते जपून ठेवतात. त्याच्या पाठकोऱ्या भागाचा त्यांना काहीतरी लिहिण्यासाठी उपयोग होतो. ते तिकीट नंतरही ते फेकून देत नाहीत. रद्दीच्या कागदाची एक पिशवी त्यांनी केली आहे. त्यात ते ठेवतात. पुरेशी रद्दी साठल्यावर रद्दीवाल्याला देऊन टाकतात. त्यांना अमेय आणि सृजन अशी दोन मुले आहेत. अमेय पुण्यात बी एस्सी करतो. सृजन दापोलीच्या शाळेत शिकतो. दोघंही सायकल वापरतात किंवा आपल्या आईवडिलांप्रमाणे बसचा वापर करतात. आपल्या आईवडिलांची साधी जीवनशैली त्यांनीही अंगिकारली आहे. ही दोन्ही मुले इतर सर्वसामान्य मुलांसोबत सरकारी मराठी माध्यमाच्या शाळेतच शिकली. समाजाच्या सर्व स्तरातील मुलांसोबत त्यांना मुक्तपणे शिकू दिले, खेळू दिले. समाजाच्या, निसर्गाच्या सान्निध्यात ती वाढतील याची काळजी घेतली.

जीवन जगण्यासाठी तुम्हाला किती पैसे लागतात असे विचारल्यावर दिलीपदादा हसत हसत म्हणतात. आम्हाला महिना पाच हजार रुपये खूप होतात. त्यातूनही पैसे उरतात. शिवाय आता पुस्तकांची रॉयल्टी, व्याख्यानांचे मानधन वगैरे धरून दहा बारा हजार रुपये मिळतात. एवढ्या पैशांचं काय करायचं हा प्रश्नच पडतो. ते म्हणतात, ‘ अर्थार्जन करायचं ते केवळ उदरनिर्वाहासाठीच! अनावश्यक वस्तूंचा संग्रह करायचा नाही. तुम्ही आम्ही तर चपला, बूट, कपडे, फर्निचर इ. वस्तूंचा किती अनावश्यक साठा करतो. निसर्गाच्या सान्निध्यात जीवन जगायचं. बागकाम करायचं. त्यानं आनंद मिळतो. माणूस हा दिनचर प्राणी आहे. निशाचर नाही. त्यामुळे दिवसा काम करावं. रात्री जागत बसून विजेचा अपव्यय करू नये. दिवसाचा प्रकाश डोळ्यांसाठी चांगला असतो. रात्री काम करण्याने संगणक, मोबाईल वापराने डोळ्यांवर ताण पडतो. दिवसा उपलब्ध असलेल्या सूर्यप्रकाशाचा भरपूर वापर करून घ्यावा. कपडे वाळवण्यासाठी वॉशिंग मशीन न वापरता सूर्यप्रकाशात ते वाळवावेत. भांडी घासण्यासाठी राखेचा वापर करावा म्हणजे तेच सांडपाणी बागेला वापरता येते. शहरातील लोक पाण्याची अक्षरशः नासाडी करतात. कपडे, भांडी धुण्यासाठी नळ सुरूच ठेवतात. गाडी धुण्यासाठी मुबलक पाणी वापरतात.

त्याऐवजी बादलीत पाणी घेऊन गाडी ओल्या फडक्याने पुसली तर कमी पाण्यातही स्वच्छ करता येते. अंघोळीसाठी साबण वापरण्याची आवश्यकता नाही. साबण वापरला नाही तर अर्धी बादली पाण्यातसुद्धा छान अंघोळ होते. शिवाय ते पाणी झाडांना वापरता येते. दिलीपदादा आणि पौर्णिमाताई स्वयंपाकासाठी गॅसचा वापर करत नाहीत. ते वाळलेल्या काटक्या किंवा तुटलेल्या फांद्यांचा वापर करून चुलीवर स्वयंपाक करतात. त्याशिवाय सोलर कुकर स्वयंपाकासाठी वापरतात. त्यांच्या घरात टीव्ही नाही, मिक्सर नाही. बातम्या कळण्यासाठी आणि करमणुकीसाठी एक रेडिओ फक्त आहे. ताक रवीने घुसळतात. काही वाटायचे असले तर पाट्या वरवंट्यावर वाटतात. असे करण्यासाठी कष्ट जरूर पडतात, वेळ लागतो पण त्यातून त्यांना एक वेगळा आनंद मिळतो. शिवाय शारीरिक व्यायाम होतो. महिन्याकाठी जेमतेम एक ते दोन युनिट ते वीज वापरतात. त्याचे सत्तर पंचाहत्तर रुपये बिल येते तेवढेच. पण ते गमतीनं म्हणतात, ‘ आम्ही टाटा अंबानींपेक्षा महागडी वीज वापरतो. एका युनिटला सत्तर रुपये! ‘ 

जीवन जगण्याची काही सूत्रे त्यांनी ठरवली आहेत. त्याप्रमाणे आधी ते वागतात आणि मगच लोकांना सांगतात.

सूर्योदवपूर्वी उठावेच. अनेशापोटी काही व्यायाम वा योगासने करावी. ट्रेडमिलवर व्यायाम करणे त्यांना मंजूर नाही कारण त्यासाठी विनाकारण विजेची नासाडी होती. त्यापेक्षा फिरायला जाणे हा सर्वोत्तम व्यायाम आहे. त्यामुळे निसर्गाचे सान्निध्यही लाभते. दिवसातून एखादा तास तरी थोडा घाम येईपर्यंत काही शारीरिक कष्टाचे काम करावे. त्यामुळे आरोग्य चांगले राहते. झाडं, माती, पालापाचोळा म्हणजे घाण नाही. जे बायो डिग्रेडेबल आहे त्यामुळे रोग होत नाहीत. माती, पालापाचोळा यांना रोज एकदा तरी हात लागलाच पाहिजे. घरात नैसर्गिक खेळती हवा आणि पुरेसा उजेड असावा. पंख्याची गरज भासू नये आणि गरज लागलीच तर अगदी कमीतकमी वापर करावा. ए सी चा वापर तर नकोच. माठातील पाणी प्यावे. फ्रीजचा वापर टाळावा. ताजे अन्न, फळे, भाजीपाला खावा. शक्यतो घरीच जेवावे. बाहेरचे खाऊ नये. प्रवासात जाताना सुद्धा दिलीपदादा आणि पौर्णिमाताई स्टीलचे ग्लास सोबत नेतात. त्यातच ते चहावाल्याकडून चहा घेतात. चहासाठी कागदी वा प्लास्टिकचे मग वापरून पर्यावरणाची हानी करणे त्यांना मान्य नाही. दुपारी सूर्य डोक्यावर आला की जेवावं आणि संध्याकाळी अंधार पडण्याआधी जेवून घ्यावं. रात्र ही विश्रांतीसाठी आहे. दिसामाजी काहीतरी ते लिहावे या समर्थांच्या उक्तीचं ते पालन करतात. ते म्हणतात गरज आणि हाव यात आपल्याला फरक करता आला पाहिजे. निसर्ग आपल्या गरजा भागवू शकतो पण आपली हाव मात्र तो पुरी करू शकत नाही. आपल्या उत्पादन वाढीच्या आणि हावेच्या लालसेमुळे निसर्गाला आपण ओरबाडतो आहोत. पुढच्या पिढ्यांसाठी आपण काही ठेवणार आहोत की नाही?

त्यांचं एकंदरीत वागणं आपल्यासारख्या शहरी जीवनमान अंगवळणी पडलेल्या लोकांना विचित्र वाटेल. उपभोगासाठी विविध वस्तूंचा संचय करणाऱ्या आणि त्यासाठी भरमसाठ पैसा खर्च करणाऱ्या आपल्यासारख्यांना त्यांची जीवनशैली पचनी पडणार नाही. पण हे लक्षात घ्यायलाच हवे की हे दोघे उच्चशिक्षित आहेत. केवळ मी पर्यावरणस्नेही वागून असा कितीसा फरक पडणार आहे असा विचार त्यांनी केला नाही. त्यांनी सुरुवात स्वतःपासून केली. गांधीजींचे फोटो लावून व्यासपीठावर त्यांच्यावर बोलणाऱ्या आपल्यासारख्या लोकांपेक्षा गांधीजींच्या तत्वांचे खरे अनुकरण या दोघांनी केले आहे असे म्हटले तर वावगे होणार नाही. या दोघांची आध्यात्माची बैठकही पक्की आहे. विचारांची बैठक पक्की आहे. एकदा ठरवले की ते निर्धाराने करतात. गेली पंचवीस वर्षे ते ही जीवनशैली जगत आहेत. अनेक मंडळी आवर्जून त्यांचं घर, त्यांची जीवनशैली पाहायला जातात. अशा व्यक्तींचंही ते स्वागत करतात. त्यांचे ‘ स्वप्नामधील गावा ‘ हे पुस्तक त्यांना असे जीवन जगताना आलेले अनुभव आपल्याला सांगते. ‘ *थेंबांनी जर भरते घागर, का उधळावा उगाच सागर*? ‘ हे त्यांचे तत्वज्ञान आपणही एकदा जरूर विचार करावा असे आहे.

 समाप्त

© श्री विश्वास देशपांडे

चाळीसगाव

प्रतिक्रियेसाठी ९४०३७४९९३२

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ मोक्ष…  भाग – २ ☆ विभावरी कुलकर्णी ☆

विभावरी कुलकर्णी

🌈 इंद्रधनुष्य 🌈

☆ मोक्ष…  भाग – २ ☆ विभावरी कुलकर्णी ☆

(पण आम्ही अगदी निग्रहाने, मनावर दगड ठेवून त्या सगळ्या मोहाकडे दुर्लक्ष केले. गर्दी इतकी अलोट होती, की एकमेकींचा हात सुटण्याची भीती होती. म्हणून आम्ही एकमेकींचे हात घट्ट धरून चालत होतो. मैत्रिणी एकमेकींना समजावत होत्या, “आधी दर्शन घेऊया. मग येताना निवांत खरेदी करू!” कारण पुढे काय वाढून ठेवले आहे, याची आम्हा कोणालाच कल्पना नव्हती.)

इथून पुढे – –

गर्दीच्या लाटांतून वाट काढत, ढकलले जात आम्ही कसेबसे मंदिराच्या मुख्य आवारात पोहोचलो. साधारणपणे आपण कोणत्याही मंदिरात प्रवेश करताना प्रवेशद्वाराजवळ चप्पल-बुटांचे जोड काढून ठेवतो. आम्हीही चपला काढणार होतो. पण त्या अथांग गर्दीचा अथांग पसारा पाहून आम्ही ठरवले, आधी जरा रांग कुठे आहे ते शोधूया, मग चपला काढू.

आणि आमचा हा निर्णय किती योग्य होता, हे पुढच्याच क्षणी कळाले!

दर्शन रांगेचा शोध घेता घेता, दर्शनापूर्वीच आम्हाला संपूर्ण मंदिराला एक भव्य प्रदक्षिणा घालावी लागली. वाटेत प्रत्येक दुकानदाराचा आग्रह सुरू होता, “मावशी, चप्पल इथे काढा, नारळ-फुल घ्या!” पण आम्ही त्या आग्रहाला बळी पडलो नाही. जर सुरुवातीलाच चपला काढल्या असत्या, तर उन्हात अनवाणी पायांनी संपूर्ण मंदिराला प्रदक्षिणा घालावी लागली असती.

मंदिराच्या मागच्या बाजूला ३० ते ४० दगडी पायऱ्या चढून वर जायचे होते. आता तिथे पायऱ्यांजवळ आल्यावर मात्र चपला कुठे काढायच्या, हा प्रश्न निर्माण झाला. गर्दीत चप्पल हरवण्याची भीती होतीच. अशा वेळी माझी नेहमीची ‘युक्ती’ कामी आली! तशी मी फारच धोरणी आणि हुशार आहे बरं का… (असा आपला स्वतः विषयीचा गोड गैरसमज)

मी माझ्या बॅगेतून एक प्लास्टिकची पिशवी काढली, चपला त्या पिशवीत टाकल्या आणि ती पिशवी स्वतःच्या खांद्याला अडकवून घेतली! माझी ही युक्ती पाहून मैत्रिणींनीही पटकन आपापल्या चपला पिशवीत भरल्या. चला, चपला हरवण्याची किंवा चोरीला जाण्याची एक मोठी चिंता तर कायमची मिटली!

असा गोल-गोल वळसा घालून आल्यावर आम्हाला वाटले, ‘हाहा! आता दर्शन होणार!’ आम्ही एका छोट्या लाकडी दरवाजातून मंदिराच्या मुख्य आवारात प्रवेश केला. पण आत पाऊल ठेवताच देव आपल्यापासून किती दूर आहे, याची दाहक कल्पना आली!

आतमध्ये अथांग पटांगणात बांबूच्या भल्यामोठ्या काठ्या बांधून गोल-गोल फिरणाऱ्या शेकडो ओळी (Barricades) तयार केल्या होत्या. तो एक प्रकारचा चक्रव्यूहच होता! आम्ही त्या रांगेत उभे राहिलो. १० मिनिटे… २० मिनिटे… १ तास… २ तास… ३ तास उलटून गेले! तरीही त्या रांगा संपण्याचे नावच घेत नव्हत्या. आम्ही जसे पुढे जायचो, तशी नवीन रांग समोर उभी राहायची.

आता चपला पिशवीत असल्याने आम्ही अनवाणी होतो. पायाखाली छोटे-छोटे खडे टोचत होते. काही वेळाने आम्हाला त्या रांगा न संपण्याचे खरे गुपित कळले. गर्दीतली बरीच हुशार माणसे बांबूच्या काठ्यांच्या खालून सरपटत, रांग ओलांडून मधल्या मध्ये पुढच्या रांगेत शिरत होती! लोक सर्रास नियम मोडत होते. मग प्रामाणिकपणे रांगेत उभ्या असणाऱ्या आमचा नंबर कसा बरं लवकर लागणार?

पण त्या कंटाळवाण्या आणि त्रासाच्या रांगेतही अनेक गमतीजमती अनुभवायला मिळाल्या. रांगेत उभ्या उभ्याच अनोळखी लोकांशी गप्पा सुरू झाल्या. कित्येक वर्षांपूर्वी ताटातूट झालेल्या काही जुन्या मैत्रिणी तिथे अचानक भेटल्या. लहान मुले तर बांबूच्या खालून इकडून तिकडे पळण्याचा आणि रांगेत लपाछपी खेळण्याचा आनंद घेत होती. काही चतुर महिला तर आपल्या लहान मुलांना बांबूच्या खालून पुढे पाठवायच्या आणि “अहो, माझे लहान बाळ पुढे गेले!” असे सांगून मुलाच्या निमित्ताने स्वतःही ४-५ रांगा ओलांडून पुढे जायच्या!

आम्ही मात्र शांत होतो. आमच्या मनात एकच विचार सुरू होता ‘मोक्षदात्या कपर्दिकेश्वराच्या दर्शनाला चाललोय, तर थोडे कष्ट तर होणारच ना! ईश्वरप्राप्ती एवढी सोपी कुठे असते? ‘ या सात्विक मानसिकतेमुळे आम्ही त्या शारीरिक त्रासाचाही आनंद घेत होतो.

त्याच वेळी आमच्या रांगेत शेजारी एक अतिशय सात्विक, भाविक महिला भेटली. तिने मंदिराचे महत्त्व, तिथल्या वृक्षाची महती आणि दर्शनाने कशी ‘मोक्षप्राप्ती’ होते, यावर प्रवचनवजा भाषण सुरू केले.

ती अगदी भारावून सांगू लागली, “हे बघा बायकांनो! देवाच्या दारी रांगेत मधे शिरणे पाप आहे! देवाचे दर्शन घ्यायचे असेल तर शरीराला कष्ट सोसावेच लागतात. जेव्हा पायात खडे टोचतात, तहान-भूक व्याकुळ करते आणि शरीर थकते… तेव्हाच खऱ्या अर्थाने आपल्या पापांचे क्षालन होते आणि ते दर्शन आपल्याला मोक्षाकडे घेऊन जाते!”

तिने स्वतः आजवर कोणकोणत्या तीर्थक्षेत्री किती शारीरिक कष्ट सहन करून, उपाशी पोटी रांगेत उभे राहून दर्शन घेतले, याचे असे काही रंगवून रंगवून वर्णन केले, की आम्ही अगदी भारावून गेलो! आम्हाला वाटले, ही कुणी सामान्य स्त्री नसून प्रत्यक्ष मोक्षाचा रस्ता दाखवणारी साक्षात सात्विक मूर्तीच आहे. आम्ही तर तिच्या पाया पडायच्या विचारात होतो!

इतक्यात कुणाचा तरी धक्का लागला आणि आमचे लक्ष क्षणभर विचलित झाले. २-३ मिनिटांनी जेव्हा आम्ही त्या ‘मोक्षदात्री’ महिलेकडे पुन्हा पाहिले, तर ती गायब! आम्ही आजूबाजूला तिला शोधू लागलो. ‘अचानक ही कुठे गेली? ‘

काही वेळाने आमची नजर पुढे गेली आणि आमचा डोळ्यांवर विश्वासच बसेना! जी महिला आम्हाला एक मिनिटापूर्वी ‘कष्ट सोसून दर्शन घेतल्याने कसा मोक्ष मिळतो’ याचे ज्ञान पाजळत होती… ती स्वतःच बांबूच्या खालून अत्यंत शिताफीने सरपटत, ७ ते ८ रांगा ओलांडून, प्रामाणिक भाविकांना मागे टाकत कपर्दिकेश्वराच्या दर्शनासाठी बरीच पुढे निघून गेली होती!

तिचा तो ‘अद्भूत मोक्ष मार्ग’ पाहून आम्ही डोक्याला हात लावला आणि आम्हाला हसू आवरेनासे झाले!

बरेच बांबू ओलांडणाऱ्या लोकांचे धक्के सहन करत, पायात शेकडो खडे टोचवून घेतल्यानंतर, तब्बल ५ तासांच्या खडतर वाटचालीनंतर अखेर आम्ही कपर्दिकेश्वराच्या गर्भगृहाच्या समोर उभे राहिलो!

आणि… समोरचे ते दृश्य पाहताच आमचे भान हरपले!

गर्भगृहात महादेवाची ती अलौकिक, नयनरम्य तांदळाची पिंडी साक्षात तेजाने तळपत होती. एका चिमुकल्या लिंबावर संपूर्ण तांदळाची पिंडी अत्यंत कौशल्याने आणि श्रद्धेने तोललेली होती. त्या पिंडीचे दर्शन होताच, मनातील सर्व थकवा, पायांच्या वेदना आणि ५ तासांची पायपीट एका सेकंदात गायब झाली! ५ तासांच्या कष्टाचे खऱ्या अर्थाने सार्थक झाले होते. डोळे भरून आम्ही त्या ‘मोक्षदात्याचे’ रूप मनात साठवून घेतले. हात आपोआप जोडले गेले आणि तोंडून शब्द बाहेर पडले “हर हर महादेव! कपर्दिकेश्वर महाराज की जय!”

दर्शन घेऊन आम्ही बाहेर आलो. ५ तास सतत रांगेत उभे राहिल्यामुळे शरीर पूर्णपणे गळून गेले होते. सकाळी गाडीत ठरवलेली ती जत्रा, खरेदी, बांगड्या, भांडी… या कशाचीही आता इच्छा उरली नव्हती.

पण त्या गर्दीत एक चांगली गोष्ट घडली. परतीच्या वाटेवर रस्ता चुकण्याची किंवा चालण्याचे कष्ट करण्याची अजिबात गरज नव्हती! कारण भाविकांची ती अथांग गर्दीच मागून ढकलून ढकलून आम्हाला पुढे नेण्याचे काम करत होती! आम्हाला फक्त एकमेकींचे हात घट्ट धरून उभे राहायचे होते. गर्दीच्या त्या मानवी प्रवाहाने आम्हाला थेट मंदिरापासून २ किलोमीटर दूर असलेल्या पार्किंगपर्यंत आणून सोडले!

इतके तास दर्शनातच निघून गेल्यामुळे आणि शरीर थकल्यामुळे, इतर ठिकाणी फिरण्याचा किंवा कुठल्या दुसऱ्या मंदिरात जाण्याचा प्रश्नच उरला नव्हता. आम्ही सरळ गाडीत बसलो आणि घराची वाट धरली.

अशा प्रकारे, ओतूरच्या त्या मोक्षदात्या कपर्दिकेश्वराचे अद्भुत दर्शन, रांगेतील त्या ‘मोक्ष’ सांगणाऱ्या बाईची गंमत आणि तो संपूर्ण प्रवास आमच्या आयुष्यातील एक ‘अविस्मरणीय भावयात्रा’ बनून राहिली!

समाप्त — 

©  विभावरी कुलकर्णी

सांगवी, पुणे

मोबाईल नंबर – ८०८७८१०१९७

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ “विलक्षण मराठी भाषा…” – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – शशी नाडकर्णी-नाईक ☆

शशी नाडकर्णी-नाईक

? वाचताना वेचलेले ?

☆ “विलक्षण मराठी भाषा…” – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – शशी नाडकर्णी-नाईक 

रस्ता – मार्ग

  • जो कसाही जाऊ शकतो तो रस्ता.
  • जो ध्येयाकडे नेतो तो मार्ग.

खरं – सत्

  • बोलणं खरं असतं
  • सत्यला सोबत पुरावा जोडावा लागतो.

घसरडं – निसरडं

  • पडून झालं की घसरडं.
  • सावरता येतं ते निसरडं.

अंधार – काळोख

  • विद्युत पुरवठा खंडीत झाला की होतो तो अंधार.
  • निसर्गात जाणवतो तो काळोख.

पडणं – धडपडणं

  • पडणं हे अनिवार्य.
  • धडपडणं हे कदाचित सावरणं.

पाहणं – बघणं

  • आपण स्वत:हून पाहतो.
  • दुस-यानं सांगितल्यावर होतं ते बघणं.

पळणं – धावणं

  • पाकीटमार काम झाल्यावर जे करतो ते पळणं.
  • ट्रेन पकडतांना आपण जे करतो ते धावणं.

झाडं – वृक्ष

  • जे माणसांकडून लावलं जातं ते झाडं.
  • जो आधीपासूनच असतो तो वृक्ष.

खेळणं – बागडणं

  • जे नियमानं बांधलेलं असतं ते खेळणं.
  • जे मुक्त असतं ते बागडणं.

ढग – मेघ

  • जे वा-याने ढकलले जातात ते ढग.
  • जे नक्की बरसतात ते मेघ.

रिकामा – मोकळा

  • वेळ जो दुस-याकडे असतो तो रिकामा.
  • आपल्याकडे असतो तो मोकळा वेळ.

निवांत – शांत

  • *कष्ट केल्यानंतर मिळतो तो निवांतपणा.
  • काहीच न करता बसून मिळतो तो शांतपणा.

आवाज – नाद

  • जो आपल्या चालण्यानं होतो तो आवाज.
  • जो घ॔टेचा होतो तो नाद.

झोका – हिंदोळ*

  • जो आपला नंबर बागेत कधी लागेल याची वाट पाहायला लावतो तो झोका.
  • जो मुक्तपणे झाडांमधून खेळता येतो तो हिंदोळा.

स्मितं – हसणं

  • मनात एखादी गोड आठवण आली की जे दिसतं ते स्मित.
  • जे लोकांसमोर दाखवावं लागतं ते हसणं.

अतिथी – पाहुणा

  • जो यावा यावा असा वाटतो तो अतिथी.
  • जो आला की कधी जाईल असं मनात येतं तो पाहुणा.

घोटाळा – भानगड

  • जो अचानक नकळत होतो तो घोटाळा.
  • जी नियोजनबद्ध पद्धतीने होते ती भानगड.

आभाळ- आकाश

  • भरून येत ते आभाळ
  • निरभ्र असत ते आकाश

लेखक:अज्ञात

प्रस्तुती : सौ. शशी नाडकर्णी-नाईक

≈ संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – पुस्तकांवर बोलू काही ☆ “ओडिसी” – मूळ लेखक : होमर – अनुवाद : श्री प्रणव सखदेव ☆ परिचय – श्री हर्षल सुरेश भानुशाली ☆

श्री हर्षल सुरेश भानुशाली

? पुस्तकावर बोलू काही ?

☆ “ओडिसी” – मूळ लेखक : होमर – अनुवाद : श्री प्रणव सखदेव ☆ परिचय –  श्री हर्षल सुरेश भानुशाली ☆

पुस्तक : ओडिसी 

लेखक : होमर

अनुवाद : प्रणव सखदेव

प्रकाशक : मधुश्री प्रकाशन, पुणे 

पृष्ठ :- १८४ 

मूल्य: २५०₹ 

प्रकार:- पुराणकथा, साहसकथा

होमरचं ‘ओडिसी’ हे एका वीराच्या घरी परतण्याची कथा आहे. ट्रॉयचं युद्ध संपल्यानंतर इथाका या आपल्या राज्यात परतण्यासाठी ओडिसियसला तब्बल दहा वर्षांचा संघर्ष करावा लागतो. युद्ध संपलं असलं तरी त्याच्यासाठी खरी लढाई तेव्हाच सुरू होते. समुद्र, राक्षस, जादूगारिणी, देवतांचा कोप, मोह, फसवणूक आणि स्वतःच्या निर्णयांची किंमत आणी प्रत्येक टप्प्यावर त्याची परीक्षा घेतली जाते. दुसरीकडे इथाकामध्ये त्याची पत्नी पेनेलोपी वीस वर्षांपासून त्याची वाट पाहत आहे. सर्वांना ओडिसियस मरण पावल्याचं वाटत असल्याने तिच्यावर दुसरं लग्न करण्यासाठी दबाव टाकला जातो. मुलगा टेलीमॅकस वडिलांचा शोध घेण्यासाठी निघतो. त्यामुळे ही केवळ साहसकथा राहत नाही; ती एका कुटुंबाची, निष्ठेची आणि घरी परतण्याच्या अटळ इच्छेची कथा बनते.

या महाकाव्यात देवतांचं स्थानही तितकंच महत्त्वाचं आहे. अथेना सतत ओडिसियसच्या पाठीशी उभी राहते, तर पोसायडन त्याच्या प्रत्येक पावलावर अडथळे निर्माण करतो. त्यामुळे संपूर्ण कथा ही एका माणसाच्या संघर्षाइतकीच दोन देवतांमधील अदृश्य संघर्षाचीदेखील कथा वाटते. ओडिसियस बुद्धिमान आहे, धाडसी आहे; पण हट्टीही आहे. अनेकदा त्याच्या स्वतःच्या निर्णयांमुळे संकटं ओढवतात. त्याच्या चुका, त्याचं चातुर्य आणि संकटांमधून मार्ग काढण्याची वृत्ती हेच त्याच्या व्यक्तिमत्त्वाचं खरं वैशिष्ट्य आहे. होमरचं लेखन आजही प्रभाव टाकतं, कारण ते केवळ साहस सांगत नाही; ते युद्धाची किंमत, माणसाची मानसिकता, घरापासून दूर राहण्याची वेदना, सत्तेचा मोह आणि आशा न सोडणाऱ्या मनुष्यस्वभावाबद्दलही बोलतं. म्हणूनच ओडिसी हजारो वर्षांनंतरही तितकीच जिवंत वाटत.

प्रणव सखदेव यांनी केलेला मराठी अनुवाद अत्यंत प्रवाही आहे. ग्रीक पुराणातील अनेक व्यक्तिरेखा, स्थळं आणि प्रसंग असूनही वाचन कुठेही क्लिष्ट वाटत नाही. उलट प्रत्येक प्रकरणासोबत पुढे काय घडणार याची उत्सुकता वाढत जाते. तुम्ही यावर आधारित चित्रपट पाहणार असाल तर आधी हे पुस्तक नक्की वाचा, कारण त्यामुळे कथानक, पात्रं आणि त्यामागची पार्श्वभूमी अधिक चांगल्या प्रकारे समजते. आणि जर पुस्तक आधीच वाचलं असेल, तर चित्रपटातील अनेक प्रसंग नव्या दृष्टीने अनुभवता येतात. जर तुम्हाला ग्रीक पुराणकथा, साहसकथा वाचण्याची आवड असेल, तर ‘ओडिसी’ नक्की वाचा. हजारो वर्षांपूर्वी लिहिलेली ही कथा आजही तितकीच ताजी, रंजक आणि विचार करायला लावणारी वाटते.

परिचय : श्री हर्षल सुरेश भानुशाली

पालघर 

मो. 9619800030

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

हिन्दी साहित्य – साप्ताहिक स्तम्भ ☆ कादम्बरी # १५८ – बुन्देली कविता – ”वे पथरा खों दूद पिवा रय” ☆ आचार्य भगवत दुबे ☆

आचार्य भगवत दुबे

(संस्कारधानी जबलपुर के हमारी वरिष्ठतम पीढ़ी के साहित्यकार गुरुवर आचार्य भगवत दुबे जी को सादर चरण स्पर्श । वे आज भी हमारी उंगलियां थामकर अपने अनुभव की विरासत हमसे समय-समय पर साझा करते रहते हैं। इस पीढ़ी ने अपना सारा जीवन साहित्य सेवा में अर्पित कर दिया है।सीमित शब्दों में आपकी उपलब्धियों का उल्लेख अकल्पनीय है। आचार्य भगवत दुबे जी के व्यक्तित्व एवं कृतित्व की विस्तृत जानकारी के लिए कृपया इस लिंक पर क्लिक करें 👉 ☆ हिन्दी साहित्य – आलेख – ☆ आचार्य भगवत दुबे – व्यक्तित्व और कृतित्व ☆. आप निश्चित ही हमारे आदर्श हैं और प्रेरणा स्त्रोत हैं। हमारे विशेष अनुरोध पर आपने अपना साहित्य हमारे प्रबुद्ध पाठकों से साझा करना सहर्ष स्वीकार किया है। अब आप आचार्य जी की रचनाएँ प्रत्येक मंगलवार को आत्मसात कर सकें गे। 

आज प्रस्तुत हैं बुन्देली कविता – वे पथरा खों दूद पिवा रय।)

✍  साप्ताहिक स्तम्भ – ☆ कादम्बरी # १५८ ☆

☆  बुन्देली कविता – वे पथरा खों दूद पिवा रय ☆ आचार्य भगवत दुबे ✍

बे पथरा खों दूद पिबा रय

देखौ कैंसो भ्रम फैला रय

आइ महामारी, व्यापारी

रोज कफन कौ, रेट बढ़ा रय

 *

पंडत जी छप्पन भोगों की

ओ गरीब खें कथा सुना रय

 *

दिवता सें कम नइँ बे सेवक

जो भूखों के पेट भरा रय

 *

ऐड़ी-चोटी कर चुनाव में

नेता अपने दाँव लगा रय

 *

बम्म पटकबे बारे भग गय

घायल रिश्ते, घाव दिखा रय

 *

भगवतसाम्हूँ प्यासो तड़पत

बे नदिया कौ पता बता रय

© आचार्य भगवत दुबे

82, पी एन्ड टी कॉलोनी, जसूजा सिटी, पोस्ट गढ़ा, जबलपुर, मध्य प्रदेश

संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक (हिन्दी) – श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’ ≈

Please share your Post !

Shares

हिन्दी साहित्य – कविता ☆ “ये अजीब इत्तेफाक़ है” ☆ मिर्ज़ा अज़ीज़ बेग ☆

मिर्ज़ा अज़ीज़ बेग

?  कविता – ये अजीब इत्तेफाक़ है… ? मिर्ज़ा अज़ीज़ बेग ☆

दिल के प्याले में

स्याही भरी होती है

यादों में आए उबाल से

छलक कर बाहर निकल आती है

गीले हरुफ़ लिखती हुई

किसी इबारत, किसी तहरीर को

शक्ल देती है

कभी ये हरुफ़ जल्दी सूखते हैं

कभी एक लंबे अरसे को गीले

रह जाते हैं

छूना नहीं इन गीले हरुफ़ों को

रोशनाई फैल कर,

सफ़े को धुंधला कर देगी

ये धुंधलापन सालता रहेगा

कचोटता रहेगा

लिहाज़ा, स्याही के सूखने का इंतज़ार

तो करना ही होगा…!!!!!

© मिर्ज़ा अज़ीज़ बेग

संपर्कबिलासपुर (छ ग) मो नं 8319743682

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक (हिन्दी) – श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’ ≈

Please share your Post !

Shares