मराठी साहित्य – जीवनरंग ☆ लंच टाईम… – भाग-१ ☆ श्री प्रदीप केळूसकर ☆

श्री प्रदीप केळुस्कर

?जीवनरंग ?

☆ लंच टाईम… – भाग-१ ☆ श्री प्रदीप केळूसकर

विश्वास जाधव बिल्डींगच्या लिफ्टमधून बाहेर पडला आणि शिळ वाजवत पार्किंगमधील गाडीच्या दिशेने गेला. पार्किंग लॉटमधून त्याने शिताफीने गाडी बाहेर काढली आणि गल्लीतून बाहेर पडून गाडी मुख्य रस्त्यावर आणली. आता अंधेरीचा स्टुडिओ त्याच्या डोळ्यासमोर येऊ लागला. आज स्पर्धेचा शेवटचा दिवस म्हणजेच ग्रँड फिनाले. आज फारसे टेंशन नाही, कारण स्पर्धेचा निकाल जवळपास तयार होता. गेले आठ आठवडे स्पर्धा सुरु होती. एकंदर वीस हजार गायकांमधून वीस जण निवडले गेले. आणि या वीस जणांना आपल्या तिघांच्या हातात सोपवले गेले. माधुरी ही हिंदीतील गायिका या चॅनेलच्या प्रत्येक स्पर्धेला असे. ह्या चॅनेलची स्पर्धा आणि माधुरी हे ठरलेलेच होते. तिला फॅन्स पण फार होते. गेले पाच सिझन तिने गाजवले होते. विश्वासला पण तिच्या गाण्याबद्दल आदर होता. पण परिक्षक म्हणून सोबत बसल्यावर त्याच्या लक्षात आले की ती फार गर्विष्ठ आहे आणि या चॅनेलची लाडकी असल्याने जवळ जवळ हुकूमशहा आहे. दुसरा परिक्षक मंगेश हा पॉप म्युझिक मधील लोकप्रिय कलाकार. तो स्वभावाने बरा होता. पण उडत्या चालीची गाणी आणि पाश्चात्य गाणी त्याला जास्त आवडत. त्यामुळे शास्त्रीय संगीतावर आधारित गाणी त्याला आवडत नसत. त्यामुळे अशा गाण्यावर तो टिका करायचा हे विश्वासला आवडत नव्हते. तिसरा विश्वास. हा उदयोन्मुख संगीतकार. त्याचा पाया शास्त्रीय संगीताचा होता आणि गुरु चरणदास यांचेकडे तो शास्त्रीय गाणे शिकला होता आणि त्यांच्या गुरुकुलमध्ये अजूनही शिकत होता. विश्वासचे दोन मराठी आणि दोन हिंदी सिनेमे गाजले होते. आणि हिंदी अल्बम्सनी लोकप्रियता मिळविली होती. खरं म्हणजे हिंदीतील या प्रसिध्द चॅनेलने विश्वासला परिक्षक म्हणून निवडले तो प्रसंग विश्वासच्या डोळ्यासमोर आला. एका मराठी चॅनेलच्या वार्षिक कार्यक्रमाच्यावेळी विश्वास आमंत्रितांच्या खुर्चीत बसला होता. एवढ्यात एक पंचवीस वर्षाची मुलगी त्याच्या जवळ आली – 

‘‘ आप विश्वासजी है ना ?’’

‘‘ हा, आप कौन ?’’

‘‘ मै, रचना.. एन चॅनल की तरफसे -’’

‘‘ क्या है ?’’

‘‘ मेरे सुपीरियर आपसे बात करना चाहते है, जरा बाहर आओगे ?’’

विश्वास बाहेर गेला. ती त्याला पार्किंग लॉटकडे घेऊन गेली. तिथे एका कारमध्ये तिचा सुपिरियर बसला होता. 

‘‘ हाय मिस्टर विश्वास, मै शशांक .. फ्रॉम चॅनेल एन, हमारे चॅनेल का पाँचवा सुरसंगम एक महिनेके बाद शुरू होगा.  हम चाहते है की, आप सुरसंगम प्रोग्रॅमके परीक्षकके रुप में काम करें ’’

‘‘ लेकिन मेरी कमिटमेंट…..’’

‘‘ कोई बात नहीं, ये प्रोग्रॅमकी शुटींग सप्ताहमें एक दिन होगी, सुबह १० से रात १० तक, बाकी के दिन आप फ्री है,’’

‘‘ मुझे सोचना पडेगा ’’

‘‘ कोई बात नही, हम फिर कल फोन करेंगे ’’

रात्रौ विश्वास पत्नी अनिता बरोबर बोलला. तिला पण एवढ्या मोठ्या चॅनेलने स्वतःहून संपर्क ठेवल्याबद्दल आश्चर्य वाटले. पण चांगले पैसे मिळत असतील तर ऑफर स्विकारायला हरकत नाही असे तिने मत व्यक्त केले. दुसर्‍या दिवशी एन चॅनेलवरुन पुन्हा रचनाचा फोन आला. चॅनेलने आठवड्याला लाख रुपये पेमेंट देण्याचा शब्द दिला. एक दिवस शुटींग, प्रत्येक एपिसोडचे कपडे वगैरे सर्व चॅनेल्सचे. विश्वासने विचार केला. प्रत्येक महिन्यात सहा लाख मिळत असतील आणि दोन महिने स्पर्धा चालली तर बारा लाख मिळतील. शिवाय या हिंदी चॅनेलमुळे भारतभर प्रसिध्दी. त्यामुळे हिंदी आणि प्रादेशिक सिनेमा मिळण्याची शक्यता मोठी. कार्यक्रमामुळे घराघरात आपण ओळखलो जातो हा मोठा फायदा. विश्वासला वाटले, राजापूर तालुक्यातील आपल्या गावातसुध्दा प्रत्येक घरी आपण दिसू. त्यामुळे आपले आईवडील, नातेवाईक, गाववाले किती खूष होतील हे त्याच्या डोळ्यासमोर आले आणि त्याने ही ऑफर स्वीकारली.

विचार करता करता त्याची गाडी स्टुडिओपाशी आली. त्याची गाडी पाहताच रखवालदार मनोहर धावला. त्याने फाटक उघडून त्याची गाडी आत घेतली. विश्वासने गाडी पार्किंग लॉटमध्ये लावताच मनोहरने गाडीचा मागचा दरवाजा उघडला. त्याची बॅग बाहेर काढून तो विश्वास बरोबर सेटच्या दिशेने चालू लागला. 

‘‘ मग विश्वासराव, फायनल किरण मारणार का ?’’

‘‘ बघू , अजून दोन परीक्षक आहेत ना?’’

रखवालदार मनोहर हळू आवाजात म्हणाला –

‘‘ तसं नव्हं, या आधी प्रत्येकवेळी धक्काच बसलाय, आम्ही अंदाज बांधतो एक आणि जिंकतो दुसराच काही करा विश्वासराव त्या किरणलाच नंबर द्या, केवढा लांबून आलाय ओ, उत्तराखंडवरुन आणि गातो काय एक नंबर. या मुंबईत त्याची लोक फॅन झालीत. गरीब आहे पोरगा. पहिल्यांदा आला तवा त्याच्या अंगावरची कापडं बघवत नव्हती. मी त्याला माझ्या पोराची कापडं आणून दिली. मग चॅनेलची कापडं आली सोडा. “

‘‘ बर, बघू.’’ असं म्हणून विश्वास सेटवरील आपल्या केबिनकडे गेला. त्याने पाहिले माधुरीच्या केबिनमधून मोठमोठ्याने हसण्याचा आवाज येत होता. म्हणजे माधुरी लवकरच सेटवर पोहोचली होती. मंगेशची केबिन बंद होती. म्हणजे तो अजून पोहोचला नव्हता. विश्वासने आपली केबिन उघडली आणि एसी चालू केला. टेबलावरील ग्लासातून पाणी प्याला आणि लॉकर उघडून गेल्या दोन महिन्यातील मार्कलिस्टवर त्याने नजर टाकली. मघाशी रखवालदार मनोहर बोलला ते त्याला पुन्हा आठवले. ‘‘ या आधी प्रत्येक स्पर्धेत धक्काच बसला ’’ 

‘ धक्का का बसला ?’  विश्वासच्या मनात आलं, धक्का बसू शकतो, कारण सर्वसामान्य लोकांचे मत आणि परिक्षकांचे मत एक होणे कठिण असते. प्रेक्षक मूळ गायकाचा आवाज हुबेहुब काढला की खुष होतात पण परिक्षकाला सुर, ताल, राग, आलापी सर्वच पहावे लागते…  तो विषय झटकून विश्वासने आठ आठवड्यातील मार्कलिस्ट समोर आणली. पहिल्या चार आठवड्यात पंधरा जण कट झाले. आणि शेवटच्या महिन्यात राहिले पाच जण. जयंती, अरुण, केदार, तन्मय, निकिता. दोन मुलगे तीन मुली. त्याने स्वतः दिलेल्या मार्क्सचा अंदाज घेतला. केदार निःसंशय पहिला होता. त्याने पाहिले केदार ९० टक्केच्यावर होता. त्यानंतर जयंती, तन्मय, अरुण ही मंडळी पंच्याऐंशीच्या आसपास. आणि निकिता ऐंशीच्या खाली. त्याच्या डोळ्यासमोर केदार आला…..  केदार पासवान…  १४-१५ वर्षाचा, उत्तराखंडमधून आलेला. चेहर्‍यावरुन कळतं होतं तेथल्या आदिवासी भागातून आला असणार. मोडकी तोडकी हिंदी बोलत होता. कदाचित त्याची मातृभाषा वेगळी असेल. पहिल्या वीसात आला तेव्हा खूप घाबरलेला होता आणि सिनीअर परिक्षक माधुरी हिंदी आणि इंग्लिश मधून बोलून त्याला नर्व्हस करत होती. पण आपल्याला केदार आवडायचा कारण तो मदन मोहन, अनिल विश्वास, खैय्याम अशा संगीतकारांची गाणी म्हणायचा. 

– क्रमशः भाग पहिला 

© श्री प्रदीप केळुसकर

मोबा. ९४२२३८१२९९ / ९३०७५२११५२

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर ≈

Please share your Post !

Shares

Select मराठी साहित्य – जीवनरंग ☆ घराचं वाटणीपत्र… – भाग-२ ☆ श्री व्यंकटेश देवनपल्ली ☆

श्री व्यंकटेश देवनपल्ली

? जीवनरंग ❤️

☆ घराचं वाटणीपत्र… – भाग-२ ☆ श्री व्यंकटेश देवनपल्ली

(आत डोकावून पाहिलं. भिंती बांधून वाड्याचं रूपांतर असंख्य खोल्यांत झालं होतं.) इथून पुढे — 

“वास्तविक, गेल्यावर्षी या घराचं वाटणीपत्र झालं. तेच तुझ्या वहिनीच्या जिव्हारी लागलं. ‘तुम्ही भावांच्या मुलांना इंग्रजी शाळेत पाठवून चांगलं शिक्षण दिलंत आणि आपल्या मुलांकडे मात्र दुर्लक्ष केलंत. तुम्हीच स्वत:ला घरातला एकमेव कर्तासवरता समजून स्वत:च्या उत्पन्नाची उधळपट्टी करीत होता. कुठलाही भाऊ स्वत:च्या खिशात हात घालत नव्हता. माझ्या या वेडीचं म्हणणं तुम्ही कधीच ऐकून घेतलं नाही. आता अशी पश्चाताप करायची वेळच आली नसती.’ म्हणून ती खंत व्यक्त करायची. 

मी तिला सांगायचो, ‘अगं ज्याच्या त्याच्या नशिबात असतं, ज्याचे त्याला मिळत असते आभाळगाणे किंवा माती. भले आपली मुलं जास्त शिकली नसतील. पण आज स्वत:च्या कर्तबगारीच्या जोरावर काहीतरी कमवत आहेत ना? ते महत्वाचे आहे. आपल्या दोघांना फुलासारखं जपताहेत ना? बस्स, अजून काय हवं आहे?’ पण ते तिला पटायचं नाही. आणि एके दिवशी ध्यानी-मनी नसताना अचानक हृदयघाताने देवाघरी गेली.” 

तितक्यात सतीशच्या सुनेने चहा आणला. ‘माझी मोठी सून निर्मला’ असं सांगत सतीशने तिला माझी ओळख करून दिली. निर्मलाने मला नमस्कार केला. “मामंजीकडून आणि आमच्या सासूबाईंच्याकडून मी तुमच्याबद्दल खूप ऐकलंय.” असं म्हणत ती निघून गेली. 

चहा घेता घेता सतीश म्हणाला, “माझी दोन्ही मुलं वेगवेगळा व्यवसाय करतात. तुझी वहिनी गेल्यावर मीच त्या दोघांना दोन खोल्यांत वेगळा  संसार थाटून दिला. माझ्या जेवण्याखाण्याची व्यवस्था एक महिना माझी मोठी सून पाहते. एक महिना माझी धाकटी सून पाहते. एरव्ही देखील काही चांगलंचुंगलं केलं की ते माझ्यासाठी पाठवतातच.

दोघीही सुना मला हवं नको ते पाहतात. न्याहारी, चहा, दोन वेळचं जेवण अगदी वेळेवर माझ्या खोलीत आणून देतात. सकाळी कामावर जाताना आणि रात्री कामावरून आली की दोन्ही मुलं माझ्याकडे येऊन विचारपूस करून जातात. आणखी काय हवंय सांग? 

तुला आठवतं का? तुझ्या आग्रहाला बळी पडून मी एक विमा उतरवला होता. सुदैवाने त्याचे हप्ते नियमितपणे भरत होतो. गेल्या वर्षी त्याची बर्‍यापैकी रक्कम आली आणि तेच पैसे बॅंकेत गुंतवले. महिन्याला बाराशे रूपये व्याज येतं. त्यात माझं औषधपाणी व इतर खर्च भागतात. कुणाकडे एक रूपया मागत नाही. झालंच तर दोन्ही सुनांच्या घरी अधूनमधून पालेभाजी आणून देतो.”           

“तुझा वेळ कसा जातो?” असं विचारल्यावर सतीश थोडासा खुलला. “अरे ती काही समस्या नाही. लायब्ररीतली सगळी पुस्तकं आपले मित्र आहेत. बहुतेक करून आत्मचरित्रे वाचतो. आपल्यासारख्या सामान्य माणसांच्या आयुष्यात कुठे येतात असे डोळे दिपवून टाकणारे सोनेरी क्षण? तसंच अगदी कडेलोट व्हायच्या क्षणी ही माणसं स्वत:ला सावरून परत कशी ठामपणे उभी राहतात, आणि आपण कसे लहान लहान संकटात कोलमडून जातो हे लक्षात येतं.

पुस्तक वाचून झालं की उत्तराची अपेक्षा न ठेवता मी त्या लेखकाला पोस्टकार्डावर एक खुशीपत्र लिहून पाठवतो. दुसर्‍याला अत्तर लावताना तुमची बोटंही सुगंधी होतात म्हणतो ना तसे. 

आता बघ, संध्याकाळचे साडेसहा वाजले की दंगा करणारी ही सगळी कार्टी, हातपाय तोंड धुऊन दप्तर घेऊन माझ्या खोलीत येतात. आसनं टाकून शुभं करोति म्हणून झाल्यावर अभ्यासाला लागतात. मी तिथंच पुस्तकात डोकं खुपसून बसलेला असतो. कुणाला काही अडलं की माझ्या जवळ येऊन विचारतात. गणित, सायन्स, इंग्रजी, हिंदी आणि मराठी या विषयातलं काहीही.

आपल्या मास्तर लोकांनी असं काही घोटून घेतलंय की आज पन्नास वर्षानंतर देखील ते पुसलं गेलेलं नाही. माझ्या खोलीत काळा कापडी बोर्ड लटकवलेला आहे. त्यावर मी गणितं सोडवून दाखवतो. निबंध कसे लिहायचे त्याचे मुद्दे सांगतो. ही मुलं दोन तास अभ्यासात अगदी गढून जातात आणि साडे आठ वाजले की भुर्र्कन उडून जातात. माझाही वेळ अगदी पंख लावल्यागत उडून जातो.”         

सतीशने समोरच्या हातगाडीवाल्याला बोलावून अर्धा डझन केळी विकत घेतली. तितक्यात खेळ संपवून परत आलेल्या प्रत्येक मुलाच्या हातात सतीशनं एक एक केळं ठेवलं. सगळी पोरं धूम ठोकून पळाली. 

मी सहजच म्हटलं, “सतीश, यात तुझी नातवंडं कुठली?” 

सतीश केविलवाणं हसत म्हणाला, “खरं सांगू? या सहा नातवंडात, चार नातवंडे माझ्या दोघा भावांची आहेत. अरे, या घराच्या वाटण्या झाल्या आहेत. पण नातवंडांच्या वाटण्या झाल्या नाहीत, त्यामुळे ही सहाही नातवंडे अगदी माझ्याच वाटणीला आली आहेत असं समजतो. माझे भाऊ, मला मोठा भाऊ मानत असतील की नाही माहीत नाही पण मी या सर्व नातवंडांचा ‘मोठा आजोबा’ आहे. अगदी लहानपणापासून ही मुलं माझ्या अंगाखांद्यावर खेळलेली आहेत. मी या जगातून जाईपर्यंत ही सगळी नातवंडं फक्त माझीच असणार आहेत!” 

सतीश बराच भावुक झाला होता. संध्याकाळ होत आली होती. बाहेर चिमण्यांचा चिवचिवाट वाढला होता. आता निघावं म्हणून मी उठायला लागलो. तेंव्हा सतीशनं थरथरत्या हातानं माझा हात घट्ट धरून ठेवला होता. जणू त्याला मला सोडायचंच नव्हतं. ‘पुढच्या वेळी आल्यावर निवांत भेटेन’, असं म्हणत जड मनाने मी माझ्या मित्राचा निरोप घेतला.    

– समाप्त –

© श्री व्यंकटेश देवनपल्ली

बेंगळुरू

मो ९५३५०२२११२

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ घराचं वाटणीपत्र… – भाग-१ ☆ श्री व्यंकटेश देवनपल्ली ☆

श्री व्यंकटेश देवनपल्ली

? जीवनरंग ❤️

☆ घराचं वाटणीपत्र… – भाग-१ ☆ श्री व्यंकटेश देवनपल्ली

सकाळी वर्तमानपत्र वाचत बसलो होतो. “काय कधी आलास?” असं विचारतच भास्कर आत आला. बऱ्याच वर्षानी त्याला पाहत होतो. दाढीचे खुंट वाढलेले. अंगात अघळपघळ सदरा पायजमा. भास्कर आमच्या पूर्वीच्या घराशेजारी असायचा. अर्थात अजूनही तिथेच राहतो. 

त्याची आई कुठल्या तरी सरकारी डिपार्टमेंटमध्ये क्लार्क होती. आपल्या दोन्ही मुलांना शिकवायचा तिने खूप प्रयत्न केला. मुलगी सुनिता पदवीधर झाली, मात्र भास्कर मॅट्रिकही पास होऊ शकला नाही. मग त्याने खाजगी नोकरी धरली. 

मी विचारलं, “आई कशी आहे?” 

त्यावर मान खाली घालून बोलला, “बरी असेल. वडील गेल्यानंतर आईला काही दिवसांसाठी घेऊन जाते म्हणून सुनिता घेऊन गेली. नंतर आम्ही आईला नीट सांभाळू शकणार नाही म्हणून तिला परत पाठवायचं नांवच काढत नाही. 

या गोष्टीला तीन वर्ष झालीत. सुरक्षिततेच्या नांवाखाली आईचे सगळे दागिने आधीच सुनिताने स्वत:च्या ताब्यात घेतले. तिचा खरा डोळा आईच्या हजारांच्या पेन्शनीवरही होता. हे सगळं पूर्वनियोजित होतं. माझ्या वाटणीला तेवढं भाड्याचं राहतं घर आलंय बघ.”

एक मात्र खरं की भास्करचं त्याच्या आईवर निस्वार्थी प्रेम होतं, यात शंकाच नाही. ही विलक्षण गोष्ट ऐकून मी चाटच पडलो. 

तो पुढे म्हणाला, “बरं ते जाऊ दे. तुझा मित्र सतीश भेटला होता. त्याने तुझी आठवण काढली. गेल्यावर्षी त्याला स्ट्रोक आला होता. पठ्ठा चिवट आहे. जरा हालचाली मंद झाल्या आहेत, पण तो आपल्या पायावर उभा आहे. जमलंच तर भेट त्याला.” असं म्हणून भास्करने निरोप घेतला.      

मध्यंतरी मी सांगलीला असताना माझा एक वर्गमित्र मला भेटायला आला होता. व्यापाराच्या निमित्ताने आला होता. आम्ही जवळच्याच हॉटेलात जेवायला गेलो. भरपूर गप्पा मारल्या. “गावी आल्यावर नक्की फोन कर” असं म्हणून त्यानं निरोप घेतला.

नंतर एकदा गावी गेल्यावर त्या मित्राला मोबाईल लावला. मी ‘हॅलो’ म्हणताच तिकडून आवाज आला. “हां बोल, कसा काय फोन केलास? काही काम होतं कां?”

त्याच्या अशा अनपेक्षित कोरड्या प्रतिसादाने मी चांगलाच वरमलो. “अरे नाही. चुकून तुझा नंबर लागला वाटतं. आय अ‍ॅम सॉरी!” म्हणून फोन कट केला. त्यानंतर कधी कुणा मित्राला फोन करण्याच्या किंवा भेटण्याच्या फंदात पडलो नाही….                

सतीश माझा खूप जवळचा मित्र होता. आमचे जिव्हाळ्याचे संबंध होते. ‘चला मित्राला भेटू या’ म्हणून मी स्कूटीवरुन निघालो. वीसेक वर्षानंतर मी त्या परिसरात जात होतो. सगळंच कसं बदलून गेलं होतं. शोधत शोधत सतीशच्या घराजवळ आलो. उन्हं उतरली होती. बाहेर सहा सात मुलं अंगणात खेळत होती. त्या मुलांना सतीशच्या विषयी विचारलं. त्यांनी तिथेच झाडाखाली खुर्ची टाकून बसलेल्या गृहस्थाकडे बोट दाखवत, ओरडून सांगितलं, “आजोबा तुमच्याकडे कोण आलंय पहा.” मी गाडी लावली. 

बऱ्याच कालावधीनंतर मी सतीशला भेटत होतो. खूपच कोमेजलेला दिसत होता. मुळांपासून उखडलेल्या झाडाची जशी स्थिती होते तसा तो खुर्चीत आक्रसून बसला होता. आपल्या नेहमीच्याच चिरपरिचित पांढरा पायजमा आणि कुर्ता या वेषांत होता. त्याच्या मनाच्या स्थितीप्रमाणेच कपड्यांवर देखील सुरकुत्या पडल्यामुळे तो केविलवाणा दिसत होता. मला आश्चर्य वाटलं. तो किती ऐटीत असायचा. मी पहिल्यांदाच त्याला असा पाहत होतो. 

माझ्या डोक्यावरील कॅपमुळे त्यानं मला लगेच ओळखलं नाही. कॅप काढताच, खुर्चीतून सावकाश उठून उभा राहिला आणि हात हातात घेऊन म्हणाला, “अरे, किती वर्षांनी तुला माझी आठवण आली? चक्क दहा वर्षानंतर भेटतोयस. तुझी वहिनी नेहमी तुझी आठवण काढायची.”

एव्हाना लांबून पाहणाऱ्या मुलांच्या लक्षात आलं की ‘हा कुणीतरी आजोबांचा जवळचा मित्र असणार’. ते धावतच आले. 

सतीशने त्या पोरांना सांगितलं, “बाळांनो, आत जाऊन दोन कप चहा टाकायला सांगा.”

पोरं पळतच आत गेली. जीभ जड झाल्यानं, त्याला बोलायला काहीसं अवघड जात होतं.   

मी विचारलं,“कसा आहेस?” तर खिन्नपणे म्हणाला, “बरा आहे म्हणायचं. आला दिवस ढकलायचा. तुझी वहिनी सोडून गेली, एकटा पडलो.”

मी म्हटलं, “वहिनी अशा अचानक निघून जातील असं वाटलं नव्हतं.”

सतीश घुश्शातच म्हणाला, “जाऊ दे, गेली तर गेली. मला काही फरक पडत नाही.” 

खरं तर हा वरवरचा त्रागा होता. वयाच्या अठराव्या वर्षीच सतीशचं लग्न झालं होतं. त्यांचं एकमेकावरचं घट्ट प्रेम काही झाकलेलं नव्हतं. मी त्याच्या खांद्यावर हात ठेवताच, कसाबसा हुंदका दाबत तो म्हणाला, “अरे, तिने तरी असं मध्येच दगा द्यायला नको होतं. आताच मला तिच्या सहवासाची खरी गरज होती.”

काही वेळ स्तब्धतेत गेला. घसा खाकरत सतीश पुढं सांगत होता, “तुला तर माहीत आहे. आमचं एकत्र कुटुंब होतं. सगळ्या भावांचा वेगळा व्यवसाय होता. खरेदी विक्रीत मिळणारी दलाली हा माझा बिनभांडवली धंदा होता. सचोटीच्या व्यवहारामुळे मी भरपूर पैसे मिळवत होतो. मी एकटाच निस्वार्थीपणाने घरात लागेल तो खर्च करीत होतो.

‘जो पर्यंत तुम्ही बाजारात उभे असाल तोपर्यंत तुमचे उत्पन्न चालू राहील. त्यानंतर काय? आपल्या म्हातारपणासाठी चार पैसे मागे टाका.’ असं तुझी वहिनी सारखं सांगायची पण मी कधी मनावर घेतलं नाही. 

ती जिवंत होती तेव्हाच मी गंभीरपणे आजारी पडलो. सहा महिने बिछान्याला खिळून होतो. उत्पन्नाचं साधन गेलं. 

भावांची मुलं कर्तीसवरती झाली होती आणि घर सांभाळायची जबाबदारी जेव्हा त्यांच्यावर आली तेव्हा अचानक वेगळे होण्याचा प्रस्ताव पुढे आला. अखेर भावाभावांच्यात घराच्या वाटण्या झाल्या. माझ्या हिश्श्याला त्या कोपर्‍यातल्या तीन खोल्या आल्या.”

आत डोकावून पाहिलं. भिंती बांधून वाड्याचं रूपांतर असंख्य खोल्यांत झालं होतं. 

– क्रमशः भाग पहिला 

© श्री व्यंकटेश देवनपल्ली

बेंगळुरू

मो ९५३५०२२११२

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ जिव्हाळा… लेखक – अज्ञात ☆ प्रस्तुती : सुश्री संध्या पूरकर ☆

🌸 जीवनरंग 🌸

☆ जिव्हाळा… लेखक – अज्ञात ☆ प्रस्तुती : सुश्री संध्या पूरकर 

आईला ऑपरेशनसाठी आत नेलं, तसा प्रसन्न बाहेर रिसेप्शन काउंटर जवळच्या सोफ्यावर येऊन बसला. विशाखा सासूबाईंची फाईल घेऊन तिथेच बसली होती.

आज पहाटे साडेपाचला आई बाथरुमला जायला म्हणून उठली आणि चादरीत पाय अडकून पडली. कमरेचं हाड मोडलं होतं. तो आणि विशाखा तिला घेऊन करूणा आर्थोपेडिक हाॅस्पिटलमध्ये घेऊन आले. एक्स-रे बघून ऑपरेशन शिवाय गत्यंतर नाही असं डाॅक्टर म्हणाले. तेही लगेच करायला हवं होतं. सुदैवाने आईला इतर काही व्याधी नसल्याने बाकी रिपोर्ट्स चांगले आले. आणि आता नऊ वाजता ऑपरेशन सुरू झालं होतं. 

या सगळ्या गोंधळात दोघांना चहा घ्यायला देखील सवड मिळाली नव्हती. हाॅस्पिटलच्या कँटिनचा मुलगा चहा घेऊन आला, तसं प्रसन्न आणि विशाखा, दोघांनी चहा घेतला.

चहा पिऊन प्रसन्नाने त्याच्या बाॅसला फोन करून आज ऑफिसला येऊ शकत नसल्याचं कळवलं. विशाखानं तीन दिवस रजाच टाकलेली होती. उद्या तिच्या भावाच्या मुलीचं लग्न होतं बोरीवलीला. आज घरातलं आवरून दुपारी ती आणि सई, तिची लेक, मालाडला जाणार होत्या, तिच्या माहेरी. आणि आज सकाळी हे सगळं झालं होतं. 

तिनं ठाण्यातच राहणाऱ्या तिच्या मोठ्या जाऊबाईंना फोन लावला. सासूबाईंबद्दल कळवलं. ती पुढे काही बोलायच्या आधीच त्या म्हणाल्या, “अरे देवा ! अग आम्ही आलो असतो ग, पण काल घरी येताना हे पावसात भिजले ना, त्यांना रात्री थंडी वाजून ताप भरलाय. रात्री १०३ होता, अजूनही पूर्ण उतरलेला नाही. बघते दुपारी उतरला ताप तर संध्याकाळी मी येऊन जाईन.”

‘यांच्या तब्येतीच्या तक्रारी म्हणजे गोड बोलून नाही म्हणणं आहे. इकडे तिकडे भटकताना बरे टुणटुणीत असतात. कायम कुठल्या न कुठल्या टूरवर जात असतात आठ-पंधरा दिवस !’ विशाखा मनात म्हणाली. 

“अहो, राजूभावजींना फोन करायला हवा ना?” तिनं प्रसन्नला विचारलं. राजू म्हणजे प्रसन्नचा दोन नंबरचा भाऊ ! प्रसन्न सगळ्यात धाकटा. 

” करू सावकाश ऑपरेशन झाल्यावर ! तो आणि त्याची बायको काही इथे यायचे नाहीत. नुसत्या उंटावरून शेळ्या हाकतील. शंभर चौकश्या करतील. असं कसं झालं? तुम्ही काळजी घ्यायला हवी होती. यांव करा नि त्यांव ! तू आणि सई ठरल्याप्रमाणे जा बोरीवलीला. मी करतो मॅनेज इथे. तसंही पेशंटचं जेवणखाण इथेच मिळणार आहे.”

“अहो, तुम्ही एकटे कसं कराल? मी आज काही जात नाही. उद्याचं उद्या बघू. आईंना असं ठेवून जाऊन माझं काही तिथे लक्ष लागणार नाही. मीराताईंना विचारायचं का? पण नकोच, त्यांच्या घरी आधीच एवढं खटलं आहे. तरी त्या बिचार्‍या येतात धावून मदतीला !”

मीरा प्रसन्नची बहिण, लांबच्या नात्यातली. ती मुलुंडला राहायला होती. तिच्या घरी तिचे सासू-सासरे दोघंही ऐंशीच्या पुढचे. त्यामुळे विशाखाला तिची मदत मागायला संकोच वाटायचा. 

असाच थोडा वेळ गेला आणि ऑपरेशन थिएटरमधून त्यांना बोलावणं आलं. ऑपरेशन व्यवस्थित झाल्याचं सांगून डाॅक्टर गेले. पाच-सहा दिवस तरी आईला हाॅस्पिटलमध्ये राहावं लागणार होतं. तिला सेमी डिलक्स रूममध्ये हलवण्यात आलं. एका रूममध्ये दोन पेशंट असणार होते. 

आईला रूममध्ये ठेवून वाॅर्डबाॅय बाहेर गेल्यावर प्रसन्न आणि विशाखा आत गेले. आई अजून जरा गुंगीतच होती. रूम तशी बऱ्यापैकी मोठी होती. बाजूच्या काॅटवर एक साधारण साठीच्या बाई झोपल्या होत्या. त्यांच्याही पायाचं ऑपरेशन झालेलं दिसत होतं. 

त्यांच्या बाजूला बहुतेक त्यांचा नातू बसलेला होता. पण तो आपल्या मोबाईलमध्ये व्यस्त होता. त्याने फक्त कोण आहे ते बघण्यासाठी एकदा मान वर करून बाजूला बघितलं आणि पुन्हा मोबाईलकडे नजर वळवली. 

सईचा फोन आला होता, ‘ मी येऊ का आजीजवळ बसायला? ‘ उद्या लग्नाला कसं जायचं आपण, या विचाराने थोडी नाराजही झाली होती ती ! पण विशाखानं तिला घरीच थांब म्हटलं. कामवाली यायची होती. शिवाय कुकर लावून, बाहेरून पोळी-भाजी आणून /मागवून ठेवायलाही सांगितलं. मग तिनं  प्रसन्नला घरी पाठवलं. तो स्वतःचं आवरून आणि जेवून आला की विशाखा घरी जाणार होती.

विशाखा सासूबाईंच्या काॅटजवळ येऊन बसली आणि तिचा फोन वाजला. ‘जिव्हाळा’ च्या कुलकर्णी काकू बोलत होत्या. “अग, सुधाताईंचं ‘सुप्रभात’ आलं नाही ग्रुपवर सकाळी, म्हणून मी फोन केला, तर तो पण उचलला नाही त्यांनी. म्हणून मी आणि सानेबाई तुमच्या घरी गेलो. सईकडून हा सगळा प्रकार कळला. झालं का सुधाताईंचं ऑपरेशन?”

“हो काकू, ऑपरेशन झालं व्यवस्थित. अजून एक-दीड तासांनी त्या शुद्धीवर येतील, म्हणाले डॉक्टर.”

“बरं, तुला आज बोरिवलीला जायचंय ना भाचीच्या लग्नासाठी? ते तू ठरल्याप्रमाणे जा. सई बोलली मला, मग ग्रुपवर कळवलं मी ! आम्ही सगळी जबाबदारी वाटून घेतली आहे दोन दिवसांसाठी. रात्री माटेवहिनी येणार आहेत सुधाताईंजवळ झोपायला. त्यांना सकाळचा चहा नाश्ता आमची सुरभी देईल, ऑफिसला जाता जाता ! मग काळेबाई, निशा, देशपांडे काकू आणि मी उद्याचा दिवसभर आळीपाळीने थांबू. रात्री सरोजाताई येतील झोपायला. त्यामुळे प्रसन्नलाही लग्न अटेंड करता येईल उद्या. बाकी काही मदत लागली तर शहाणे, कुलकर्णी वगैरे पुरूष मंडळी आहेतच.” असं म्हणून काकूंनी फोन ठेवला सुद्धा ! 

‘जिव्हाळा’, हा खरं तर सासऱ्यांच्या पेंशनर्स मित्रांचा ग्रुप.  ठाण्यात राहणाऱ्या या पंधरा जणांनी हा ‘जिव्हाळा’ ग्रुप बनवला होता. या ग्रुपपैकी कोणाच्याही घरी काही अडचण असेल तर, बाकीचे जाऊन शक्य ती सगळी मदत करायचे. मग ती मदत आर्थिक असो, सोबत करण्याची असो की इतर काही.

कोणाची मुलं परदेशी, कोणाची असून नसल्यासारखी, तर कोणी एकेकटेच. शिवाय नोकरी व्यवसायामुळेही मुलं-सुना दिवसभर बाहेर असायची. वेळ – प्रसंग काही सांगून येत नाही. पण अडचणीवर मात करण्यासाठी या सगळ्यांनी हा सोपा मार्ग शोधला होता. विशाखाचे सासरे गेले तेव्हा या मदतीचा अनुभव त्यांनी घेतला होता.

सासऱ्यांनंतर सासूबाई आता या ग्रुपवर होत्या. प्रत्येकाने सकाळी ‘सुप्रभात’, चा मेसेज टाकला म्हणजे, ‘All is well’ समजायचं. इतर वेळी फोन, मेसेज करायचाच गरज असेल तर. त्यानंतर विशाखा, प्रसन्न आणि इतर काही जणांची मुलं-सुनादेखील या ग्रुपला मदत करण्यात सामील होऊ लागले होते. 

विशाखाला अगदी भरून आलं होतं. इथे रक्ताच्या नात्याची माणसं सबबी सांगत होती आणि ही  जिव्हाळ्यानं जोडलेली माणसं मात्र खंबीरपणे पाठीशी उभी राहिली होती. आता ती निश्चिंत मनाने भाचीच्या लग्नाला जाऊ शकणार होती. 

लेखक : अज्ञात

प्रस्तुती : सुश्री संध्या पूरकर 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ नशिबा आधी कर्म धावते… ☆ सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे ☆

सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे

🌸 जीवनरंग 🌸

☆ नशिबा आधी कर्म धावते… ☆ सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे ☆

सुलभा घरातील पसाऱ्यात शांत बसली होती. अवतीभवती कोणी नव्हते. आईला जाऊन आज पंधरा दिवस झाले होते. दिवस कार्य झाले  आणि नातेवाईक मंडळी आपापल्या गावी परत गेली .तशीही फारशी ये- जा त्यांच्या घरी नव्हतीच, पण आई गेली आणि होते तेही बंध संपले. वडील आधीच गेले होते. आई तेव्हापासूनच हबकली होती.तशी तीही फार कर्तृत्ववान होती असं नव्हतं, पण घरात सर्वांना चार घास जेवायला तरी मिळत होतं!

सुलभा विचारांच्या शृंखलेत गुरफटली होती. तेवढ्यात “ताई,ए ताई, एकटीच काय करतेयस? संध्याकाळ झाली ना! देवाला दिवा पण नाही लावलास?” बाहेरून हाकारा करीतच संगीता आली आणि सुलभाची विचार श्रृंखला तुटली! 

आई गेल्यानंतर आज पहिल्यांदाच संगीता कामावर गेली होती. आनंदही कामावरून तितक्याच आलाच.. दोघेही भुकेजून आले होते .सुलभाने मनाची मरगळ झटकली आणि जेवणाची तयारी केली. संगीता आणि आनंद दोघेही तिला दिवसभरातील कामावरच्या गोष्टी सांगत होते. संगीता म्हणाली,” ताई ,आज डॉक्टर काकांनी सगळी चौकशी केली. पैशाची काही गरज असेल तर सांग म्हणाले. आनंदनेही त्या गोष्टीला दुजोरा दिला. दोघेही एकाच ठिकाणी कामाला होते आणि त्या डॉक्टरांचा आधारही होता घराला! सुलभाच्या मनात आले किती चांगली माणसं भेटली आहेत नशिबाने! जेवण  झाल्यावर संगीता आणि आनंद आपापल्या कामाला लागले. संगीताने भांडी घासली, आनंद आवरायला मदत करत होता.सुलभा आवराआवर झाल्यावर निवांत काही वेळ बसली.संगिता, आनंद झोपायला गेले,पण सुलभाला काही झोप लागेना! सगळ्या जीवनाचा चलत् चित्रपट तिच्या डोळ्यासमोर दिसत होता!

आपली आई स्वभावाने प्रेमळ,गरीब स्वभावाची होती खरी,पण जगातील व्यवहार तिला कळला नाही.तिचे नशिबंच असे कसे की तिला कुठूनच सुख मिळाले नाही.

माहेरी परिस्थिती बरी होती,भावंडे सहा…सगळी शिकलीसवरली,पण ही एकटीच चौथी पास!

सुलभा ला सुरुवातीचे बालपणी चे दिवस आठवले , जेव्हा त्यांचे एकत्र कुटुंब होते .आई वडील, आजी -आजोबा, दोन काका-दोन काकू,मुले अशी सर्व एकत्र राहत होती. पण आजी – आजोबा गेल्यानंतर घरात वाटणीच्या गोष्टी सुरू झाल्या. सुलभा समजत्या वयाची होती. वाटणीत यांच्या वाट्याला फक्त दोन खोल्या आल्या. सुलभा आईला विचारत असे, ‘आपल्यालाच का फक्त दोन खोल्या? बाकीच्यांना तीन तीन खोल्या आहेत.’ ‘अगं , आपल्या ला कर्ज होते, ते भागवण्यासाठी काकांनी पैसे दिले. त्यामुळे आपल्याला एक खोली कमी मिळाली.’

सुलभाच्या वडिलांचे दुकान होते. दुकानात कामाला एक दोन माणसे होती. तशीच काउंटरवर  एक मुलगी होती. ती हुशार होती. कामात चलाख होती. सुलभाच्या वडिलांना तिची कामात मदत होत असे. कसे कोण जाणे, सुलभाच्या वडिलांचे तिच्याशी सूत जुळले आणि घराकडे दुर्लक्ष होऊ लागले! हळूहळू दुकानचा कारभार त्या मुलीच्या हातात गेला. बाकीच्या दुकानांच्या स्पर्धेत दुकानचा खूप कमी झाला.

शेवटी दुकानावर कर्ज झाले आणि ते विकून टाकावे लागले. १/२ वर्षातच वडीलही गेले आणि सुलभा आता पूर्णपणे घराला बांधली गेली!नशीबा आधी  कर्म धावते याचा प्रत्यय सुलभाला येऊ लागला.

त्या दरम्यान सुलभा एका वाचनालयात कामाला जाऊ लागली होती. आता ती कॉलेजला होती . आर्ट्स साईडला असल्यामुळे सकाळी कॉलेज करून संध्याकाळी ती लायब्ररीत काम करू शकत असे. तिथे पुस्तक बदलायला येणाऱ्या स्वप्नीलच्या प्रेमात ती कशी पडली तिचा तिलाच कळलं नाही. स्वप्निल देखणा होता. आर्थिक परिस्थिती बरी असावी बहुतेक! सुलभा त्याच्या प्रेमात पडली. सुलभा ला ते दिवस आठवत होते. स्वप्निल तिच्याशी गोड गोड बोलत असे.एक दिवस त्याने सुलभाला सांगितले,’ माझे तुझ्यावर प्रेम आहे. मला तू आवडतेस आणि मला वाटतं ,तुलाही मी आवडतो. तुझी संमती असेल तर आपण लग्न करूया का?’सुलभा मनातून खूप आनंदली. तिलाही स्वप्नील आवडत होता.तिला परी कथेतील राजकुमार मिळाल्यासारखा आनंद वाटला होता.मागचा पुढचा विचार न करता

सुलभा ने त्याच्या प्रेमाला होकार दिला. घरी आईला हे सांगितले. मुलगा आपल्या जातीतील असल्याने घरच्यांनी फारसा विरोध केला नाही.

दोघांचे लग्न थाटात पार पडले.अगदी द्रुष्टं लागण्यासारखी जोडी दिसत होती.

… सुलभाने नवीन आयुष्याला सुरुवात झाली.नव्या नवलाईचे  दिवस होते ते!आनंदात दिवस चालले होते. स्वप्निलच्या घरची मंडळी चांगली होती पण स्वप्निल काहीच करत नव्हता. छोटे मोठे उद्योग करत असे, पण फारसे शिक्षण नसल्यामुळे मिळकत बेताचीच होती. आपल्या अडाणी वयातल्या प्रेम विवाह मुळे आपलं तर नुकसान झाले याचा तिला पश्चाताप होत असे. लवकरच तिच्या संसारात नवीन पाहुणा येण्याची चिन्ह दिसली. आता तरी स्वप्निल काहीतरी करेल या आशेवर सुलभा दिवस घालवत होती.

सुलभाचे मन भूतकाळातील आठवणींवर तरंगत होते .तिला पहिली मुलगी झाली. खूप छान छोटीशी भावली सारखी! दिसायला छान गोरी पान मुलगी पाहून सर्वांनाच आनंद झाला. हळूहळू स्वप्निल संसारात रुळला होता. काही दिवस चांगले गेले. अचानक तिच्या सासूबाईंना पॅरॅलेसिस चा अटॅक आला. दवाखान्याच्या खर्चा पायी पुन्हा एकदा आर्थिक परिस्थिती खालावली. सुलभाने आता पदार्थ करून विकण्याचे काम सुरू केले. स्वप्निल ची फारशी मदत नसे. पण आहे त्या परिस्थितीत आनंदाने राहत होती. सुलभा- स्वप्नील ची जुई आता तीन वर्षाची झाली होती. खूप गोड मुलगी होती ती! सुलभाला पुन्हा एकदा आई होण्याची चाहूल लागली.

या वेळेला मुलगा होऊ दे ,मग मात्र थांबू या.. असा त्यांनी विचार केला.

आयुष्याला कलाटणी मिळण्याचा तो दिवस उजाडला.. मुलगा झाला पण त्याचा आजार वेगळाच होता. त्याच्या पाठीचा कणा नीट नव्हता. त्यामुळे थोड्याच दिवसात लक्षात आले की तो आपल्या पायावर उभा राहू शकणार नाही.. सुलभा हादरली. ऑपरेशन साठी खूप खर्च येणार होता. सर्वांच्या मदतीने त्याचे ऑपरेशनही केले आणि तो कुबड्या घेऊन का होईना पुढे चालू शकेल इतपत त्याच्यामध्ये सुधारणा होईल, असे डाॅक्टरांनी सांगितले. एकंदर परिस्थिती आता कठीण झाली होती आणि स्वप्निल चा तर तिला काहीच आधार नव्हता! शेवटी नाईलाजाने मुलांना घेऊन सुलभा माहेरी परत आली.

माहेरी येऊनही सुलभाच्या परिस्थितीत फारसा फरक पडत पडला नव्हता. इकडे आल्यावर स्वतःची दोन मुले, पाठची बहीण भाऊ  आणि आई असं सर्व कुटुंब सुलभाला पाहावे लागत होते. तिने आता डबे करायला सुरुवात केली.

तसेच काही घरची पोळ्यांची कामे सुरू केली.

धाकटी बहीण,संगिता  18 वर्षाची झाली आणि तिच्या मामांनी तिच्या लग्नाचे पाहायला सुरुवात केली पण जेमतेम दहावी शिकलेल्या मुलीला चांगले स्थळ कुठून मिळणार? शहरात तर नाहीच, मग जवळपासच्या गावातील स्थळे पाहता पाहता एका साखर कारखान्याच्या गावाचे स्थळ कळले. मुलगा कारखान्यात क्लार्क म्हणून काम करत होता. एक आत्या त्याच्याजवळच राहत होती. ती अशीच नवरा गेल्याने माघारी आली होती. राहायला दोन खोल्या होत्या. अधून मधून आत्या तिथे येते एवढेच कळलं .. एरवी मुलगा एकटाच राहत होता असं कळलं होतं. मामा-मामी घर बघून आले. संगिताने मुलगा पसंत केला. त्या दिवशी आत्त्या तिथे आलेली होती, पण एकटीच आहे तेव्हा येत असेल म्हणून मोठ्या लोकांनी फारसे लक्ष घातले नाही. नातेवाईकांनी कुठे फारसे जायला नको, म्हणून लग्न ठरवून टाकले एक जबाबदारी संपली म्हणून! चार सहा महिने ठीक गेले .संगिताकडून बरेच दिवसात काही खुशाली कळली  नव्हती ,पण हळूहळू तिची घुसमट कुठेतरी बाहेर पडणारच होती. एकावेळी ती माहेरी निघून आली आणि तिने मामीला सांगितले की, ‘आत्त्या तिच्या नवऱ्याच्या घरी येऊन राहते आणि संगिताला फक्त घरकाम, भांडी धुणे करणारी मोलकरीण केले होते’. हे कळताच मामा, मामी प्रत्यक्ष तिच्या गावी गेले. चौकशी करता ते सर्व खरेच निघाले! बिचारी संगिता! मागच्या जन्मी आपण काय केले होते म्हणून असे आपल्या वाट्याला आले! संगिता माहेरी आली आणि सुलभावर आणखीन एक जबाबदारी येऊन पडली!

माहेरी येऊनही सुलभाच्या परिस्थितीत फारसा फरक पडत पडला नव्हता. इकडे आल्यावर स्वतःची दोन मुले, पाठची बहीण, भाऊ  आणि आई असं सर्व कुटुंब सुलभाला पाहावे लागत होते. तिने आता डबे करायला सुरुवात केली.

तसेच काही घरची पोळ्यांची कामे सुरू केली.त्यातच स्वतः च्या अपंग मुलाला सांभाळायचे! असं कुठलं नशीब घेऊन आली होती सुलभा की कुठूनच तिला सुख मिळत नव्हते!

धाकटा आनंदही फारसा हुशार नव्हता.. संगीता आणि आनंद दोघेही डाॅक्टर काकांकडे कामाला जात होते आणि पोटापुरते मिळवत होते.डाॅक्टरही सहृदयी होते, मुलांना आपणहून मदत करत होते.आई अशिक्षित आणि तिन्ही मुलांच्या अशा तीन तऱ्हा!त्यातच आईचे आजारपण सुरू झाले.तब्येतीने स्थूल आणि संधिवात यामुळे तिला काम तर होत नव्हते.शेवटी आजार वाढत गेला आणि आई गेली…

आई जाऊन आता पंधरा दिवस झाले.तिला  आई गेल्याचे दुःखही वाटत नव्हतं इतकं मन बधिर झाले होते. पोरकेपणाची जाणीव होत होती. आई काही करत नव्हती पण निदान घरात तिचे अस्तित्व तरी होते. आताही दोन भावंडे आणि दोन मुले यांना सांभाळत आपले पुढे कसे होणार हेच तिला कळत नव्हते! शेवटी काळाच्या हातचे भावले आहे आपण! जसं घडेल तसं घडेल! आपलीच कर्माची कहाणी! नशिबापुढे काही चालत नाही, खचून न जाता उभं राहायला पाहिजे या विचाराने सुलभा उठली.आणि घरातील पसारा आवरू  लागली.उद्यापासून कामे सुरू करू या! या सर्वांच्या तोंडात चार घास घालण्यासाठी तिच्यातील मोठी बहीण आणि मुलांची आई जागी झाली होती या एका मनोबळावर सुलभा उठली आणि घराला आवरू लागली!

© सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ घरातलीच — एक गृहितक! – सुश्री अनुजा बर्वे ☆ प्रस्तुती – सुश्री पार्वती नागमोती ☆

? जीवनरंग ❤️

☆ घरातलीच — एक गृहितक! – सुश्री अनुजा बर्वे ☆ प्रस्तुती – सुश्री पार्वती नागमोती ☆

सकाळच्या जेवणाच्या तयारीतच तिने डिनरसाठी लागणारी कोशिंबीर नि भाजीचीही चिराचिरी करून ठेवली. ‘आता फुलकेही दोन्ही वेळचे उरकून घेऊ ’ ह्या विचाराने तिनं तवा तापत टाकला नि पोळपाट लाटणं हाती घेतलं.सरावाने लाटण्याखालची पोळी झरझर गिरकी घेत मोठी होत होती नि जोडीला  विचारांची आवर्तनंही ! 

सासूबाईंचा काल त्यांच्या मोठ्या लेकाशी झालेला संवाद  तिच्या कानावर पडला होता  तो आठवला.

(‘एकत्र कुटुंबात तग धरण्यासाठी म्हणून की काय आपले कान हळुहळु अधिकच तिखट होऊ लागलेयत ’ असा एक खोडकर विचार मनात डोकावला तिच्या ! )

“ हॅलो समीर, अरे दीप्ती नि क्षमा जायच्या आहेत  नं मुलुंडला उद्या दुपारी ? तू नि मोहन या इथेच ! ठीकै ?”

पलिकडून रूकार मिळाल्याचा अंदाज आला  तिला एकंदर संवादावरून ! 

दीप्ती नि क्षमा  तिच्या सख्ख्या जावा. मुलुंडला ज्या काकांकडचं बोलावणं आलं होतं त्यांच्याशी  तिचंही नातं, क्षमा नि दिप्तीसमानच असल्यामुळे आमंत्रण तर  तिलाही होतं त्या फंक्शनचं !

पण…

हार्ट प्रॅाब्लेमचं निदान झाल्यामुळे गेली दोनेक वर्ष  तिच्या सासूबाईंची तब्येत तशी नरमगरमच ! 

तसं तर दिप्ती-क्षमाच्याही त्या ‘अहो’ आईच ! 

परंतु … दोघीही स्वतंत्र आपापल्या घरी…ही आजार-झळ न पोचे दूरवरी … अशी सोईस्कर व्यवस्था !

‘आता २ दिवस बेड -रेस्टच घेते ’ असा सासूबाईंचा फतवा कोणत्याही क्षणी निघे. त्याप्रमाणे तो काल सकाळीही निघाला. ती घरातलीच नं, मग घरचं सगळं तिलाच बघायला हवं हा न्याय ( ?) लावून दोन्ही लेकांना ‘ इथेच या ’ चे फोन गेले देखिल.

तिचं  लग्न ठरल्यानंतरचे आईचे शब्द आठवले आत्ता तिला, “ अगं , माणसं हवीत बाई ! इथे तू एकुलती एक ! तिथे तीनतीन भावंडं ! तुम्ही दोघं सासू-सासऱ्यांजवळ रहाणार म्हणजे घर सतत जागतं असेल. ह्या ना त्या निमित्ताने सगळी जमत रहातील. भरल्या घराची चव काही न्यारीच असते बाई ! मला आतून असं वाटतंय की तुझ्या समजूतदार नि माणूसप्रिय स्वभावाने घराचं गोकुळ करशील बघ ! ”

तिला वाटलं, ‘ खरंच तेव्हा आपल्याही मनात खुशीचे लाडू फुटत होतेच की ! कामाचा उरक , बोलका स्वभाव नि हवीहवीशी नाती,  ह्या आपल्या  गुणांनी-मनोधारणेनी अख्ख्या कुटुंबाला आपलंसं करता येणं काही कठीण नाही ’ असं स्वप्न आपणही पाहिलं होतंच की !

पण……

अहो आईंची चूल शेअर करतांना, विस्तवाखालचं वास्तव निराळंच असतं हे लक्षात येऊ लागलं नि ह्याच वास्तवाच्या चटक्यांनी मग तिला जागृत आणि जागरूकही केलं. 

सणावारी एकत्र जमण्याचे कार्यक्रम, धार्मिक कार्य करण्याचे ठराव  नि अशा अनेक गोष्टी, वेगळ्या चुली मांडलेल्या मुलांच्या-सूनांच्या सोईनुसार ठरत नि जाहीर होत… Execution करायला काय…  ती आहेच घरात ! घर म्हटलं म्हणजे ‘ तिला ‘ करायला हवंच ! 

नि …’ घर ‘ कोणाचं ? तर ते मात्र नक्कीच ‘ आमचंय ‘ .. म्हणजे अहो आई नि सासरेबुवांचं !

ही अशी ट्रीटमेंट मिळूनही सुरुवातीला वाटलं  तिला की कुटुंबात घट्ट स्थान मिळवायला काही काळ तर जाऊ द्यायला हवा. कामाचं योगदान देऊन जबाबदाऱ्या पार पाडल्या की ‘ आमच्या ‘ घराचं परिवर्तन सहज आपल्या ‘ घरात होईल ‘ नि तिलाही कुटुंबपरिघावर विराजमान होता येईल.

माहेरी एकुलती एक असल्यामुळे म्हणा किंवा माहेरची न्यूक्लिअर फॅमिली असल्याने म्हणा, दुहेरी वागणूकीचा गंधही नव्हता  तिला सुरुवाती सुरुवातीला. आई-वडील स्वत:च्याच  मुलांमध्ये असा पक्षपात कसा करू शकतात ? जवळ राहिलेल्या मुलापेक्षा बाहेर गेलेल्या मुलांशी अधिक गोडीचे संबंध का दर्शवतात ? जवळ राहिलेल्या मुलाच्या बायकोबरोबर सगळ्या गोष्टी शेअर कराव्या लागण्याचा वचपा काढायला अशी रणनीती आखत असतील का ?… असे अनेक प्रश्न * तिच्या* मनात घोळत असत तेव्हा.

वर्षागणिक अनुभवाअंती  तिच्या प्रश्नांमध्ये भरच पडत गेली.

दीर-जावांनी त्यांच्या घरी केलेला एखाद-दोन दिवसांचा पाहुणचार ,आणलेल्या लहानसहान गिफ्टस् , केवळ फोनवरून केलेली विचारपूस नि ह्या सगळ्याचं ‘ अहो आईंनी ‘ भरभरून केलेलं कौतुक , (तेही घरच्या सुनेने  २४/७ दिलेल्या * योगदानाला कर्तव्याच्या* कॅटेगरीत सोईस्करपणे ठेवून) 

… म्हणजे * दिव्याखाली अंधार ?* की *कौटुंबिक राजकारण * ??

‘ वैयक्तिक घरगुती संबंध आपल्या जागी नि राजकारणी संबंध आपल्या जागी ’ ही अशी पक्षीय राजनीतीतली वाक्यं आपल्याला परिचयाची होती. पण * घरगुती राजनीती एव्हाना  चांगलीच परिचयाची झालेय आपल्याला. आज काही झालं तरी ह्या राजनीतीला बळी न पडता घराबाहेर पडायचंच नि तेही हसतमुखाने चोख प्रत्युत्तर देऊन !

‘ स्स ! हाssय !!’ शेवटचा फुलका तव्यावरून उतरवतांना जशी वाफ हातावर आली, तशी विचारांच्या तंद्रीतून * ती* बाहेर आली. 

“ हे काय तू कुठे निघालीस ? संध्याकाळी समीर नि मोहन यायचेत लक्षात आहे नं ?”

दुपारची झोप झालेली पाहून चहा घेऊन आलेल्या  तिला  अहो आईंचा प्रश्न आला.

“ अय्या, अहो आई , तुम्ही विसरलात का ? मुलुंडच्या काकांचं आपल्यालाही आमंत्रण आहे ! आणि ….

अहो, समीरदादा नि मोहनदादा यायचेत म्हणजे सगळी रक्ताची नातीच जमायचीत ! मग म्हटलं आपणच काकांच्या आमंत्रणाचा मान ठेवावा. तुम्हा सगळ्यांना मोकळेपणाने बोलता येईल नि आपल्या घरची  प्रतिनिधी म्हणून मीही समारंभात उपस्थिती लावीन. ठीक आहे ?”

तिच्या ह्या अनपेक्षित मूव्हमुळे हैराण झालेल्या ‘ अहो ‘ आईंकडे हसतमुखाने कटाक्ष टाकून  ती पर्स उचलून घराबाहेर पडली.

लेखिका : सुश्री अनुजा बर्वे

(कथा सत्य कथाबीजावर आधारित आहे. आजच्या घडीलाही जिथे जिथे असा “सापत्न भाव“ आढळत असेल त्यांना ह्या कथेशी रिलेट करता येईल असं वाटतं.) 

संग्राहिका –  सुश्री पार्वती नागमोती

मो. ९३७१८९८७५९

सांगली

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ चार लघुतम कथा – (१) शर्यत… जिंकण्यापलीकडची (२) जखम… (३) कारण… (४) शहाणपण… ☆ सुश्री मंजुषा सुनीत मुळे ☆

सुश्री मंजुषा सुनीत मुळे

? जीवनरंग ?

☆ चार लघुतम कथा – (१) शर्यत… जिंकण्यापलीकडची (२) जखम… (३) कारण… (४) शहाणपण… ☆ सुश्री मंजुषा सुनीत मुळे 

(१) शर्यत… जिंकण्यापलीकडची 

शिट्टी वाजताच त्यांची धावण्याची शर्यत सुरू झाली. सगळीच मुलं शक्य तितक्या वेगाने पुढे जाण्याचा आटोकाट प्रयत्न करत होती. सगळ्यात पुढे असलेल्या मुलाने मध्येच सहजपणे मागे वळून पाहिलं … तर पळता पळता एक मुलगा पडला असल्याचं त्याला दिसलं. तो पुढे गेलेला मुलगा लगेच मागे फिरला… मागच्या सगळ्या मुलांना त्याने थांबवलं … आणि मग त्या शर्यतीतली सगळीच मुलं  त्या पडलेल्या मुलाजवळ गेली. त्यांनी त्याला उठायला मदत केली. आणि पुन्हा ते सगळे स्पर्धक स्टार्टींग लाईनवर येऊन शांतपणे उभे राहिले. पुन्हा शिट्टी वाजली … 

….. पण यावेळी मात्र त्या सगळ्या मुलांनी एकमेकांचे हात हातात घट्ट धरून पळायला सुरुवात केली होती… आणि ते पाहून सगळे उपस्थित अक्षरशः अवाक झाले होते … हे काहीतरी त्यांच्या विचारांच्या पार पलीकडचं होतं …..त्यांच्यापैकी कुणीच कधी न पाहिलेलं .. विचारही कधी न केलेलं असं काहीतरी …

… आणि सगळ्यांच्याच नकळत मैदानात टाळ्यांचा कडकडाट व्हायला लागला… चहू दिशांना तो घुमू लागला…. त्या मुलांना त्याचं कारण काही कळत नव्हतं … पण त्या सगळ्यांचेच चेहरे मात्र शर्यत जिंकल्यासारखे आनंदाने चमकत होते… 

…  ती पळण्याची शर्यत होती शारीरिक आणि मानसिकही अपंगत्व आलेल्या मुलांची…

☆☆

(२) जखम…

आज कामाला आल्यापासूनच कांता मरगळलेली दिसत होती. चेहरा सुजलेला … डोळे रात्रभर रडत राहिल्यासारखे सुजलेले… अजूनही ओलसर आणि लाल . तिला तशा अवस्थेत बघून जयश्रीने शेवटी न राहावून विचारलं … “ काय गं कांता, आज काय झालंय तुला ? तब्बेत बरी नाहीये का ? “ .. यावर कांताने नुसतीच नकारार्थी मान हलवली… “ आल्यापासून बघतेय, अगदी गप्प गप्प आहेस… कुठेतरी हरवल्यासारखी वाटते आहेस.. काय झालंय ? अगं काल तर किती खुशीत होतीस, नवी साडी नेसून आली होतीस .. येताजाता आरशात बघून स्वतःशीच हसत होतीस … किती छान गोड दिसत होतीस … आणि आज ही अशी ? काय झालंय बाळा ? “

कांताचे डोळे तिला न जुमानता भरून आले. तिला हुंदके आवरेनात. रडतरडतच कसंतरी म्हणाली …

 “ ताई .. काल नेसलेली ती साडी ना .. ती नवऱ्याने त्याच्या त्या ठेवलेल्या बाईसाठी ….. “ बोलताबोलता ती अचानक जयश्रीच्या कुशीत शिरली … हमसून हमसून रडायला लागली. तिच्या भुंड्या हातावरचे वळ मात्र आता उघडे पडले होते… `

☆☆

(३) कारण… 

ती छकुली .. गोड, गोंडस, हसती खेळती, सदैव फुलपाखरासारखी स्वच्छंदपणे घरभर बागडणारी …. 

गेल्या आठ-दहा दिवसांपासून मात्र, बघताबघता फुलपाखराने पुन्हा कोशात जावं तसं काहीतरी वाटायला लागलं होतं तिच्याकडे पाहून …. 

काही बोलत नव्हती .. सांगत नव्हती… नेहेमीसारखी हसत बागडत नव्हती आणि रडतही नव्हती. शून्यात बघत एकाच जागी कितीतरी वेळ नुसती बसून रहात होती फक्त. 

काय झालं असावं हिला ? .. बाकी सगळं तर नेहेमीसारखंच होतं की .. मग तिच्या या अशा विचित्र वागण्याचं काय कारण असावं ते कुणाच्याच काही केल्या लक्षात येत नव्हतं .. डॉक्टरांकडे न्यावं का ? 

पण ती काही आजारी वाटत नव्हती .. मग …आई-बाबा फार बेचैन झाले होते .. तिला सारखे काही न काही प्रश्न विचारत होते. पण प्रत्येक वेळी ती फक्त त्यांच्याकडे बघत होती… बधिरपणे.  

— आठ-दहा दिवसांपूर्वी त्यांच्याकडे नेहेमी येणारा तिच्या वडलांचा मित्र चॉकलेट आणायला म्हणून तिला बाहेर घेऊन गेला होता … बस इतकंच …. 

☆☆

(४) शहाणपण… 

मॉर्निंग वॉकहून परत येतांना शीलाला आजही त्या आजी दिसल्या .. देवळासमोरच्या टपरीवर शांतपणे चहा घेत बसलेल्या. आज तिला तिचं कुतूहल शांत बसू देईना. आज रविवार असल्याने ती जरा निवांत होती.  

चहा पिऊन झाल्यावर आजी त्या देवळात गेल्या तशी तीही पाठोपाठ गेली. आतल्या एका खांबाला टेकून बसत त्यांनी पिशवी उघडली .. त्यातून बराचसा कापूस बाहेर काढला, आणि शांतपणे वाती वळायला सुरुवात केली. मग जराशाने पिशवीतून प्लॅस्टिकच्या छोट्या पिशव्या काढल्या आणि वळून झालेल्या वाती मोजायला सुरुवात केली. 

आता शीलाला तिची उत्सुकता शांत बसू देईना. ती आजींच्या शेजारी जाऊन बसली. त्यांनी एकदा शांत नजरेने तिच्याकडे पाहिलं आणि पुन्हा आपलं काम सुरू केलं. 

“ आजी, तुम्हाला एक विचारू का ? “

“ हो, विचारा की .. “ पुन्हा तसाच शांत आवाज. 

“ तुम्ही रोज एवढ्या वाती का वळता ? आणि त्याचं पुढे काय करता ? “

“ एक भाला माणूस विकत घेतो त्या, आणि त्याचे पैसे देतो मला.. म्हणून तर रोज सकाळचा पहिला चहा निवांतपणे त्या टपरीवर घेता येतो ना मला .. “

“ अहो पण आजी, या वयात इतक्या पहाटे उठून थंडी-पावसाचं असं न चुकता बाहेर पडायचंच कशाला ना ..? “

या प्रश्नावर आजी जराशा गप्प झाल्या … पण मग मंदसं हसत म्हणाल्या …. 

“ माझी सून आहे ना, ती अतिशय कर्तबगार, कर्तव्यदक्ष आणि स्वच्छतेची कमालीची भोक्ती आहे. तिला उठल्याउठल्या घर अगदी स्वच्छ, जागच्याजागी लागतं. अडगळीचा तर फारच तिटकारा आहे तिला … जराही सहन होत नाही .. आणि अडगळ पाहिली की दिवसभर चिडचिड होत राहते तिची. मग काय ? …. तिने ती अडगळ बाहेर फेकून देण्याआधी त्या अडगळीनेच आपणहून बाहेर जाणं केव्हाही शहाणपणाचंच .. नाही का ? “ …. आणि त्या शांत चेहेऱ्याने पुन्हा वाती वळायला लागल्या. … त्या शहाणपणाला मनोमन नमस्कार करत शीला उठून गेली.

©  सुश्री मंजुषा सुनीत मुळे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ “तुझ्या चितेच्या साक्षीने !” — ☆ श्री संभाजी बबन गायके ☆

श्री संभाजी बबन गायके

 

? जीवनरंग ?

☆ “तुझ्या चितेच्या साक्षीने !” — श्री संभाजी बबन गायके 

तू मला पहायला आला होतास…तेव्हाच काय ते तुला पाहता आलं चार-दोन मिनिटं…ते सुद्धा सर्व बुजुर्गांच्या गर्दीत. तुझ्या हाती चहाचा कप देताना तुला थोडंसं जवळून पाहता आलं एवढंच. चहाचा कप माझ्या हातून घेताना तू तुझ्या हाताचा स्पर्शही होऊ दिला नाहीस माझ्या बोटांना….एवढा सभ्य माणूस तू ….राजबिंडा…देखणा ! तुझा आणि तुझ्या घरच्यांनी दिलेला होकार मला पडद्याआडून ऐकू आला आणि मी तुझी झाले !  

मला लग्नाआधीच एक सवत होती….तुझं आधीच एक लग्न लागलेलं मला ठाऊक होतं…तुझ्या फौजी नोकरीशी ! आधी तुझा फोटो दाखवला होता मला आई-बाबांनी. तू  मला कधी, कसं, कुठे पाहिलं होतं कुणास ठाऊक… पण तुझ्या घरच्यांनी तुझ्या विवाहासाठी माझा प्रस्ताव ठेवला तेंव्हा तु होकार देण्यात एक क्षणाचाही उशीर लावला नाहीस…..माझा तर तुझं छायाचित्र पाहूनच होकार होता….तोंडाने शब्दही न बोलता ! माझाही फोटो तुझ्या खिशातल्या डायरीतल्या एका कप्प्यात तू ठेवलेला असशीलच…मी ही हृदयाच्या कप्प्यात तुझं चित्र जपून ठेवलं !

चार दोन दिवसांतच तुझी सुट्टी संपली आणि तो सीमेवर रुजू झालास. आणखी बरोबर तीनच महिन्यांनी आपण अग्निला सात प्रदक्षिणा घालून एकमेकांचे होणार होतो…कायमचे ! लग्नाआधी तुला एकदा तरी भेटावं, मनमोकळं बोलून घ्यावा, समजून घ्यावं…असं वाटून गेलं होतं… पण ते राहून गेलं ! आणि आमच्या घरात काय किंवा तुझ्या घरात काय…हे लग्नाआधी भेटणं मंजूर नसतं झालं! तुझा आणि माझाही आईवडिलांवर पूर्ण विश्वास. ते करतील ते अंतिमत: आपल्या चांगल्यासाठीच असणार अशी खात्रीच होती माझी.

सीमेवरून तू फोन तरी कसा करू शकणार होतास…एवढ्या नाजूक स्थितीत. सतत अतिरेकीविरोधी कारवाया, सतत डोक्यावर मृत्यूची टांगती तलवार. तुझ्याशी लग्न ठरल्यावर मी सीमेवरील बातम्या आवर्जून पहायला लागले. कुठे कुणी शहीद झाले की माझ्याही काळजाचा थरकाप उडायचा. आईच्या चेह-यावर काळजीचे ढग जमा झालेले दिसायचे. ती म्हणायची…कशाला गं पाहतेस अशा बातम्या? 

माझे होणारे थोरले दीर सुद्धा सैन्यातच आहेत, असं समजलं तेंव्हा मी त्यांच्या पत्नीशी एकदा बोलले होते. त्या म्हणाल्या होत्या…सैनिकांशी लग्न म्हणजे आपणही सैन्याची वर्दी अंगावर चढवणं. त्यांची तिथे तर आपली इथे…घरात. शेती, घरदार, मुलं, सासू-सासरे, दीर, नणंदा, दीर…मोठं खटलं असतं खेड्यांत. जवानांच्या सुट्ट्या निश्चित नसतात. ..कधी काही तातडीचं काम निघालं तर मंजूर झालेल्या सुट्ट्या रद्द होतात कधी कधी…..आपण आपलं वाट पहात रहायचं! हल्ली मोबाईलची सोय आहे पण प्रत्येकवेळी बोलणं होईलच असं नाही.तसंच झालं. तु फोन करू शकला नाहीस. म्हटलं तु सुट्टीवर येशील लग्नाआधी…तेव्हा बोलूच की फोनवर….प्रत्यक्ष भेटण्याचा विषय नव्हताच ! 

आणि आज तू आलास…..तो हा असा ! मला बघू न शकणारा, माझ्याशी बोलू न शकणार ! माझ्याशीच काय…अन्य कुणाशीही ! लग्नाच्या मुंडावळ्यांऐवजी तू आधी तिरंगा सजवला तुझ्या माथ्यावर. फुलांची उधळण होणार होती आपल्या लग्नात आपल्या दोघांवरही…त्याआधीच तू फुलांमध्ये स्वत:ला बुडवून घेतलंस. वाजत-गाजत वरात निघाली असती आपली….आज अंत्ययात्रा निघणार आहे! फुलांच्या माळांनी सजवलेली सेज असली असती आपली…तु आज चंदनाच्या काष्ठ्सेजेवर निजणार आहेस…तु एकट्याने अग्निला प्रदक्षिणा घालशील आज…मला नाही मिळणार हा हक्क! मी तुझ्या निष्प्राण देहाच्या गळ्यात पुष्पहार घालू शकेन….तुझ्या गळ्यात मला वरमाला घालायची होती ! 

लग्नात फटाक्यांची आतषबाजी व्हायची होती…ती तू लढाईत आधीच करून आलास ! 

मला तुझं नाव नाही लावता येणार कागदांवर…पण काळजातलं नाव कसं मिटवू, कसं पुसून टाकू मनाच्या कपाळावर रेखलेलं तुझ्या नावाचं कुंकू ! तुझ्यासोबत अग्निकुंडाला सात प्रदक्षिणा नाही घालता येणार…पण तुझ्या चितेला एक प्रदक्षिणा घालण्याचा हक्का आहेच मला…तुझी विधवा म्हणवून घ्यायलाही अभिमान वाटला असता. सैनिकाची विधवा असणं हे सैनिकाच्या बलिदानाएवढंच मोठं ! पण माझ्या ललाटावर या भाग्यरेषा नाही लिहिलेल्या नियतीने ! 

तुझ्याशी न बोलल्याची,न भेटल्याची खंत आता माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत राहील….मला डागण्या देत. तुला तुझे आई-बाबा खूप प्यार होते ना…तू त्यांचा सर्वांत लाडका लेक. तुझ्या विवाहाची खूप आस लावून बसले होते ते. त्यांच्या जीवनात तुझ्या जाण्याने केवढा मोठा अंधार पसरलाय…तुला कल्पना नसेल…कारण तु डोळे मिटून घेतले आहेस ! 

एक निर्णय घेतलाय मी…मी तुझी नाही होऊ शकले…पण तुझ्या आई-बाबांची तरी होऊच शकते ना? मी नाही एकटं सोडून जाणार तुझ्या आई-बाबांना. तु मला वाड.निश्चयाची अंगठी दिलीयेस….आणि त्याचबरोबर काही आठवणीही….त्याच जपत जगेन मी. कॅप्टन विक्रम बत्रा साहेबांचंही लग्न ठरलं होतं…पण ते कारगिलमध्ये शहीद झाले…त्यांच्या वाग्दत्त वधूनेही अविवाहित राहण्याचा निर्णय घेतल्याचं वाचलंय मी. व्यवहाराच्या दृष्टीने असले निर्णय वेडेपणाचे असतीलही…पण तुझ्या आठवणींना ओलांडून पुढचं आयुष्य नाही जगू शकणार मी ! स्वप्नांचा चुराडा पायांखाली पसरलेला असताना जीवनाच्या वाटेवर पावलं कशी टाकू मी? 

— तू नसलास तरी कायम तुझीच …. 

(कश्मिरात नुकत्याच झालेल्या चकमकीत ६३,राष्ट्रीय रायफल्सचे रायफलमॅन रविकुमार राणा यांनी अतिरेक्यांशी लढताना प्राणांची आहुती दिली. आणखी केवळ तीनच महिन्यांनी त्यांचा विवाह व्हायचा होता. हे कारण सांगून रविकुमार कर्तव्यापासून स्वत:ला दूर ठेवू शकत होते. पण त्यांनी मायभूमीच्या रक्षणास सर्वोच्च प्राधान्य दिले… मरणाचा विचार केला नाही… शत्रूला यमसदनी धाडण्याचा विचार केला! त्यांच्या वाग्दत्त वधूशी त्यांची भेट, संवाद झालाच नव्हता… शक्य असूनही. सामाजिक बंधनांमुळे एकतर हे शक्य नव्हते आणि त्यांची सुट्टी संपल्याने त्यांना तातडीने परतावे लागले सैन्य तुकडीत. त्यांच्या या होणार असलेल्या पत्नीने त्यांच्या घरी,त्यांच्या पालकांच्या सेवेसाठी राहण्याचा विचार बोलून दाखवला आहे. असा निर्णय कदाचित घाईचा आणि चुकीचा असेलही. परंतू सैनिकांच्या कुटुंबियांना आपल्या कौटुंबिक सुखाचीही आहुती द्यावी लागते. अनेक नाती उसवतात…भावनांचे बंध फाटून जातात. रायफलमॅन रविकुमर राणा यांच्या या न होऊ शकलेल्या पत्नीच्या भावना खूप वरच्या दर्जाच्या आहेत, परंतू कोमल हृदयाच्या कुणालाही न झेपणा-या आहेत. शेवटी प्रश्न एखाद्याच्या भावनेचा आहे..त्याचा आदर आहेच. पण रविकुमार यांच्या बलिदानाला वंदन करताना, नियतीने दिलेला कौल मान्य करून या युवतीला आयुष्यात पुढे चालायला लागण्याची प्रेरणा द्या, अशी प्रार्थना आपण काल माहेरी आलेल्या आणि उद्या सासरी निघालेल्या गौरींना करू शकतो. जय हिंद…जय भारत !🇮🇳)

© श्री संभाजी बबन गायके 

पुणे

9881298260

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ ॥अरे माणसा माणसा॥ – भाग-२ ☆ डॉ. ज्योती गोडबोले ☆

डॉ. ज्योती गोडबोले 

? जीवनरंग ❤️

☆ ॥अरे माणसा माणसा॥ – भाग-२ ☆ डॉ. ज्योती गोडबोले 

(“कांचनताई, आमचं तुमच्याकडे वेगळंच काम आहे. तुम्ही वकील आहात म्हणून मुद्दाम विचारायला आलोय.” नाडकर्णी काका म्हणाले.) – इथून पुढे — 

 “ मी माझी माहिती सांगतो. मी अनेक वर्षे मर्चंट नेव्हीत कॅप्टन होतो. भरपूर पगार, त्यामुळे मी खूप पैसे मिळवले आणि हा मोठा चार बेडरूमचा फ्लॅट घेऊ शकलो. मला दोन मुलं, एक मुलगा आणि एक मुलगी !  दोघंही आता अमेरिकेचे सिटीझन झाले आहेत. मुलगा डॉक्टर आहे तिकडे आणि त्याची बायकोही  डॉक्टरच आहे. माझ्या मुलीनं  इथून लॉ केलं आणि तिकडच्या  परीक्षा देऊन ती तिकडची एक उत्तम लॉयर झाली आहे. अतोनात पैसा मिळवतात हे लोक तिकडे. मुलाला एक मुलगा आहे आणि मुलीला दोन मुली आहेत. माझी बायको- मिसेस नाडकर्णी याही कॉलेजमध्ये प्रोफेसर होत्या. त्यांनाही पेन्शन आहे. इतकं सगळं छान असताना, तुम्हाला वाटेल की मग माझं तुमच्याकडे काय काम आहे? तर काम असं, की आम्हाला दोघांना जॉईंट मृत्युपत्र करायचं आहे. आमचा हा फ्लॅट, शिवाय बरेच फिक्स्ड  डिपॉझिट्स,  म्युच्युअल  फंडस् असे बरेच काही आहे आमचे. हे सगळं आम्ही आमच्या दोन मुलांना नाही तर कोणाला देणार हो? तर अडचण अशी निर्माण झालीय बघा की .. ..  “ काकानी श्वास घेतला. कांचनने दोघांसाठी कॉफी मागवली.

“ काका, रिलॅक्स व्हा ! तुम्हाला त्रास होत असला तर आपण उद्या बोलूया का?”  

“ नको नको ! मला आत्ताच बोलू दे आणि हे काम एकदाचं पूर्ण करून टाकूया. तर …. गोष्ट अशी झालीय की माझ्या मुलीने तिकडे अमेरिकेत तिच्याच लॉ फर्ममध्ये असलेल्या मॉर्गन नावाच्या अतिशय चांगल्या असणाऱ्या अफ्रो-अमेरिकन मुलाशी लग्न केलं आहे. म्हणजे तो कृष्णवर्णीय आहे. अत्यंत उत्तम बॅरिस्टर आहे आणि खोऱ्याने पैसे मिळतात दोघांना ! त्यांच्या लग्नाला जवळजवळ अठरा वर्ष झाली आता. दोन मुली आहेत. आणि अगदी उत्तम संसार करत आहेत ते दोघेही ! आम्ही त्यांच्या घरी अनेक वेळा जाऊनही आलोय. अतिशय गुणी, सज्जन आणि मृदुभाषी आहे हा मॉर्गन. एक काळा वर्ण सोडला तर नाव ठेवायला जागा नाही त्याच्यात. मुलीही निम्म्या भारतीय,आणि निम्म्या त्याच्यासारख्या झाल्या आहेत.” 

“ तर झालं काय की आम्ही मुलाजवळ सहज आमच्या मृत्युपत्राची गोष्ट काढली. त्याला म्हटलं आम्ही सगळं निम्मं निम्मं तुम्हा दोन्ही मुलांना देणार.  घर सुद्धा आमच्या नंतर तुम्ही विका आणि निम्मे निम्मे पैसे घ्या. तुम्ही कोणीही इथे कधीच येणार नाही. मग काय उपयोग ते ठेवून तरी?– हे सगळं आम्ही अगदी कॅज्युअली म्हणालो बघा ! पण मुलगा अतिशय चिडला, म्हणाला, ‘ मी एकटा वारस आहे तुमच्या सर्व इस्टेटीचा ! अश्विनीचा, माझ्या बहिणीचा संबंध येतोच कुठं? मला तिने ते लग्न केलेले मुळीच मान्य नाही आणि माझा तिच्याशी गेल्या अठरा वर्षात काहीही संबंध नाही. सगळं सोडून त्या काळ्याशी लग्न केलं तिनं ! तिला तुम्ही काहीही द्यायचं नाही. मला हवाय फ्लॅट पुण्यातला !’ .. हे ऐकून आम्ही दोघेही हादरून गेलो अश्विनी कधीही बोलली नाही आम्हाला की भावाशी तिचे काही बोलणे ,येणे जाणेही नाहीये. फार सज्जन आहे हो मुलगी माझी ! तर आमची मुलगीही आमची तितकीच लाडकी आहे आणि जावई सुद्धा आणि नाती पण… तर आता आम्हाला असं विल करता येईल का की ज्यामुळे तिलाही आमच्या सर्व  इस्टेटीत निम्मा हक्क मिळावा आणि नातीना प्रत्येकी दहा लाख रुपये आम्ही देऊ इच्छितो… आजी आजोबांची आठवण म्हणून ! आणि हे मुलाला आम्ही हयात असेपर्यंत समजले नाही पाहिजे. कांचन, असं इच्छापत्र आम्हाला करता येईल का ते सांगा. आता या उतारवयात आम्हाला दोन्ही मुलं हवीत आणि त्यांच्याशी संबंधही बिघडवायचे नाहीत आम्हाला !” 

नाडकर्णी काकू म्हणाल्या, “ अहो,आमच्या मुलाच्या मनात अश्विनीबद्दल इतका द्वेष असेल असं कधी मनातही वाटलं नव्हतं आम्हाला. आणि तिनेही कधीही हे आम्हाला सांगितलं नाही. किती गुणी मुलगी आहे आमची ! काहीही कमी नाहीये तिला तिकडे.आणि केलं त्याच्याशी लग्न हा गुन्हा झाला का? किती छान संसार करतात ते दोघे ! आणि आमचा मुलगा तर नामांकित डॉक्टर आहे तिथला. तरीही हे असले विचार? आम्हाला चैन पडेना म्हणून भेटायला आलोय आम्ही तुम्हाला ! दोन्ही मुलं सारखीच नसतात का सांगा आई वडिलांना? तिच्यावर आम्ही अन्याय होऊ देणार नाही.” नाडकर्णी काकूंना अतिशय वाईट वाटत होतं.  पाणी आलं त्यांच्या डोळ्यात.  

कांचन म्हणाली, “ काका काकू, मुळीच वाईट वाटून घेऊ नका. तुम्हाला तुमच्या मनासारखं इच्छापत्र येईलच येईल करता ! मी देते करून सगळा ड्राफ्ट ! तुम्ही फक्त सगळी डिटेल्स द्या मला . आणि मी करीन हे काम तुमचं ! काहीही अवघड नाहीये यात.  मुलगा असं म्हणूच शकत नाही की ‘ मी एकटा वारस आहे तुमचा !’  मुलीचाही   तितकाच हक्क आहे तुमच्या इस्टेटीवर ! तुमची स्वकष्टार्जित प्रॉपर्टी आहे, ती तुम्ही कोणालाही देऊ शकता, अगदी दान सुद्धा करू शकता काका ! आणि जेव्हा तुमचीच इच्छा आहे मुलीला तिचा निम्मा हक्क द्यायची, तर प्रश्नच येत नाही हो ! राहता राहिला मुलाला न दुखवता हे करण्याचा प्रश्न !  तेही आपण करूया. तुमचं विल तुम्ही फायनली अप्रुव्ह केलं की आपण  ते डॉक्युमेंट्स  रजिस्टर करूया. दोन  तुमचे साक्षीदारही सरकारी कचेरीत  येऊन सह्या करतील, आणि तुमचं विल रजिस्टर होईल. हे विल केलेले आपण तुमच्या मुलाला सांगायचेच नाही .त्याच्या मी दोन  कॉपीज तुम्हाला देईन. तुमचा अश्विनीवर पूर्ण विश्वास आहे ना? मग ती पुण्यात येणार आहे तेव्हा तिला ही कल्पना द्या आणि एक कॉपी तिला देऊन ठेवा. दुसरी तुमच्या बँकेच्या लॉकरमध्ये ठेवा. एक कॉपी माझ्याकडे राहील. सरकारी नोंद झाल्यावर हे दस्तऐवज कोणीही चॅलेंज करूच शकणार नाही ..बँक,  फंड्स, सगळीकडे हे ग्राह्य धरले जाईल. घर विकतानाही मुलीची सही असल्याशिवाय मुलगा एकटा तुमच्या पश्चात घर विकूच  शकणार नाही. काका काकू, आता काळजी नाही ना वाटत कसली ? मी सगळं नीट करून देते. अहो, मग वकील कशाला झालोय आम्ही? तुमच्या सारख्या ज्येष्ठ लोकांना मदत करायलाच ना? आता तुम्ही एकदम निर्धास्त रहा. आपण हे काम येत्या पंधरा दिवसात करूया पूर्ण ! “  

नाडकर्णी काकाकाकू  एकदम निर्धास्तझाले. त्यांना असा सल्ला देणारे कोणीतरी विश्वासू हवेच होते. त्यांनी कांचनचे आभार मानले. तिची काय फी आहे ते विचारून लगेच चेक दिला. पुढच्याच आठवड्यात  कांचनने फायनल ड्राफ्ट केला आणि मग  रजिस्ट्रारच्या ऑफिसमध्ये काका काकूंचे विल रीतसर रजिस्टर झालं सुद्धा ! शंभर वेळा तिला धन्यवाद देत नाडकर्णी आनंदाने घरी परतले.

रात्री भाटेकाका, म्हणजे  तिचे सासरे म्हणाले, “ कांचन, किती मोठं काम केलंस तू !आता हीही कामं तुला यायला लागतील.आता मात्र हाताखाली कोणीतरी असिस्टंट घे बरं का ! खूप कौतुक करत होते नाडकर्णी तुझं ! मला याचं आश्चर्य वाटतंय की, स्वतः खोऱ्याने पैसा ओढत असूनही  इथल्या फ्लॅटची हाव असावी मुलाला .. आणि इतका द्वेष बहिणीबद्दल? कमाल वाटते खरंच ! ‘माणूस’ नावाच्या माणसाचं मन वाचता येत नाही हेच खरं.” भाटे काका उदास होऊन म्हणाले.  निनाद हे सगळं ऐकत होताच !  खेळकरपणे तो म्हणाला, “ डॅडी, म्हणून तर आपल्या बहिणाबाई म्हणून गेल्यात ना, ‘अरे मानसा मानसा कधी होशील माणूस?’..“  भाटेकाका म्हणाले, “अगदी खरं. कांचन, अशीच मोठी हो आणि लोकांना मदत करायला कधीही मागेपुढे बघू नकोस ! “ आपल्या या देवासारख्या सासऱ्याच्या पाया पडताना कांचनला गहिवरून आलं. “ हो डॅडी ! मी तुमचे शब्द कायम लक्षात ठेवीन “ असं म्हणत कांचन डोळे पुसून  आत गेली. सासूबाईंच्या  फोटोच्या आणि देवाच्या पाया पडायला…

– समाप्त –

 

लेखिका : डॉ ज्योती गोडबोले

© डॉ. ज्योती गोडबोले

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ ॥अरे माणसा माणसा॥ – भाग-१ ☆ डॉ. ज्योती गोडबोले ☆

डॉ. ज्योती गोडबोले 

? जीवनरंग ❤️

☆ ॥अरे माणसा माणसा॥ – भाग-१ ☆ डॉ. ज्योती गोडबोले 

हे डॉक्युमेंट करायला आल्यावर कांचन अगदी अस्वस्थ होऊन गेली. कांचन  शहरातली निष्णात वकील म्हणून ओळखली  जात होती  आणि आता तर ती व्यवसायात किती छान स्थिरावली होती.कांचन एलएलएम,, ही  लॉ मधी उच्च डिग्री अतिशय चांगल्या  ग्रेडस् घेऊन पास झाली होती आणि मुद्दामच तिनं बाकीच्या रुळलेल्या वाटा सोडून  कायद्याची वाटच आपल्या करिअर साठी निवडली होती. कांचनने बारावीनंतर लॉ करायचे ठरवले तेव्हा तिच्या  पपांनी तिला विचारलं सुद्धा, ‘अग, इतके छान मार्क्स आहेत कांचन तुला,तुला वकिलीचं क्षेत्र का निवडावंसं वाटलं एकदम? आपल्या घरात तर कोणी वकील नाही.’ कांचन म्हणाली, “ तसं खास काही कारण नाही पपा!पण मला वाटलं खरं वकील व्हावंसं. आणि मग मी तुमचे मित्र आहेत ना, पुण्यातले निष्णात लघाटे काका,त्यांच्याकडे  काही वर्षे इंटर्नशिप करीन आणि मग बघेन पुढं!“ 

आपल्या अत्यंत हुशार आणि काय करायचे आहे ते नक्की ठाऊक असलेल्या लेकीकडे कौतुकाने बघत पपानी मान डोलावली. ममी म्हणाली, “अहो,तुमच्या या लाडक्या लेकीला वकील झाल्यावर नवरा मिळेल का? लोक बिचकतात बरं का, वकील सून घरात आणायला ! “ 

“ ममी,तू नको ग काळजी करू. ज्याच्या नशिबात मी असेन ना तो  समोर येऊन उभा राहील बघ ! “ 

ममीनं मान उडवली – “ तुम्हा बापलेकीसमोर कोणाचं कधी चाललंय का?करा काय हवं ते ! मी ऐकलंय ते सांगतेय. जन्मभर बेगम का ठेवायचीय लाडक्या मुलीला?”

ममी तणतणत आत निघून गेली.   कांचनने लॉ कॉलेजला ऍडमिशन घेतली. कांचनला ते कॉलेज, तिथलं वातावरण अतिशय आवडलं. चारही वर्ष पहिल्या श्रेणीत मार्क्स मिळवून कांचन एलएलबी झाली. 

“ पपा, मी सिव्हिल कोर्टातच काम करायचं ठरवलंय. अर्थात, मी कामं  करणार. म्हणजे प्रॉपर्टी ट्रान्सफर,रजिस्ट्रेशन, सगळं सगळं. फक्त मी  बाकीची कामं नाही घेणार. म्हणजे फौजदारी खटले. किंवा फॅमिली कोर्टस् ! पण माझ्या विषयाच्या अनुषंगाने मला भरपूर कामं मिळतील. बघा ना पपा, आता नवीन किती कन्स्ट्रक्शन्स होतात ना, त्या बिल्डरांना आमच्यासारखे वकील तर लागतातच. सर्व वकिली सल्ले आणि  बाकीची जमिनीची कागद पत्रे नीट बघून ती निर्वेध आहे ना ते पाहून, प्रॉपर्टी सर्च घेऊन,  पुन्हा फ्लॅट्सचे कागदपत्र करण्यापर्यंत माझी गरज लागते. त्यासाठी  मामलेदार कचेरीच्या फेऱ्या मारणे आलेच. मी हेच क्षेत्र निवडायचं ठरवलंय.” 

त्याप्रमाणे,  कांचनने सनद घेतली आणि एका प्रख्यात बिल्डरचं काम ती बघू लागली.  थोड्याच अवधीत कांचनला अनेक मोठी कामं मिळाली आणि कांचन झपाट्याने उच्च वकिलांच्या श्रेणीत जाऊन बसली. किती लहान वयात हे यश मिळवलं कांचनने !

त्या दिवशी कांचन  कोर्टात गेली होती   .कोणाच्या तरी जमिनीच्या सिव्हिल मॅटरची तारीख होती म्हणून. अजून तिला वेळ होता म्हणून सहज कांचन एकटीच कॅन्टीन मध्ये चहा प्यायला गेली. सतत कोर्टात जाऊन तिच्या बऱ्याच ओळखीही झाल्या होत्या कोर्टात ! एकीकडे फाईल्स बघत असताना चहाही घेत होती ती. 

 “ हॅलो,तुम्ही कांचन रानडे ना? मी निनाद भाटे ! तुम्ही सध्या ज्या भाटे कन्स्ट्रक्शनचं लीगल काम बघताय ना, त्या भाटे फर्मचा मी पार्टनर..आपलं सध्या युनिव्हर्सिटी रोडवरचं रीडेव्हलपमेंटचं काम चालू आहे ना, ते मी बघतोय ! फार कटकटी आहेत हो ! जुने लोक अडून बसलेत त्यामुळे सगळं काम ठप्प  पडलंय. दोन लोक अगदी अडवून धरत आहेत. बाकी सगळे तयार आहेत बघा ! “ निनाद हताश होऊन म्हणाला. “तुम्हाला ओझरतं  बघितलंय मी ऑफिस मध्ये… glad to meet  you.” निनाद म्हणाला.

पूर्वीच्या वकील मुलींसारखा हल्लीच्या स्मार्ट मुली तो काळा कोट घालत नाहीत. तर सुंदर फिटिंगचे ब्लॅक जॅकेट घालतात ड्रेसवर ! कांचनने आज जीन्सवर शर्ट आणि वर हे रुबाबदार जॅकेट घातले होते. सडसडीत बांधा, सुरेख उंची आणि आधुनिक रहाणी यामुळे किती सुंदर दिसत होती ही मुलगी ! पुन्हा बुद्धीचं तेज तर होतंच तिच्या चेहऱ्यावर ! निनादला फार आवडून गेली ही मुलगी !  तिने त्याचं ऐकून घेतलं आणि म्हणाली, “ होईल हो सगळं ! मी पेपर बघितले आहेत,.क्लिअर आहे टायटल सगळं ! होईल होईल. चहा घेणार का पुन्हा?” तिला कॉल आल्यावर ती उठली आणि निरोप घेऊन  गेली.   

निनाद मुद्दाम तिच्या वेळेवर ऑफिसमध्ये येऊ लागला. थोरले भाटे म्हणाले, ” काय चिरंजीव, तुमचं काय काम असतं हो हल्ली ऑफिस मध्ये? सिव्हिल इंजिनिअर ना तुम्ही? साईटवर जायचं सोडून इथं काय घुटमळताय ? “  निनाद म्हणाला, “ डॅडी, मुद्द्याचंच बोलतो. मस्त आहे हो तुमची वकील बाई !आपल्याला एकदम पसंत आहे ! विचारा की माझ्यासाठी ! असली अजून रिकामी तर माझं नशीब  म्हणायचं ! “ 

डॅडी हसले आणि म्हणाले ‘ बघतो विचारून !’  सहज कांचनशी बोलताना थोरले भाटे म्हणाले, “ कामाचं झालं असेल बोलून तर एक विचारू का हो वकील बाई?” 

“ काय हे काका ! वकीलबाई काय ! तुम्ही कांचन म्हणा मला ! “ 

“ बरं, कांचन, लग्न ठरलंय का कुठे तुझं?”

“ नाही हो काका !अजून तसा कोणी भेटलाच नाही.” हसून कांचन म्हणाली.

भाटे म्हणाले “ भेटलाय की ! निनाद सांगत होता,कोर्टात तुम्ही दोघांनी चहा घेतलात म्हणे ! माझा मुलगा आहे निनाद ! बघ पसंत असला तर ! तू आवडली आहेस त्याला. बघ. भेटा चार वेळा. मग तू ठरव. माझा आग्रह नाही बरं का कसलाच !”..  कांचन एकदम गोंधळून गेली. तिला निनादचा फोन आला आणि ते दोनचार वेळा भेटले. कांचनला  निनाद अतिशय आवडला. ममी पपाना तर आभाळच ठेंगणे झाले.

एवढ्या नावाजलेल्या बिल्डरकडून आपल्या लेकीला मागणी आली आणि असा उमदा जावई दारात चालत आला ! पपांनी अतिशय हौसेने लेकीचं लग्न अगदी मोठ्या  कौतुकाने लावून दिलं आणि माप ओलांडून  कांचन भाटे घरात सून म्हणून आली. दुर्दैवाने निनादला आई नव्हती. त्याच्या लहानपणीच त्या  गेल्या होत्या. एकटाच होता  निनाद . लग्न झालं, सुखाचं माप अगदी शिगोशिग भरलं आणि कांचनचा संसार दृष्ट लागण्यासारखा चालला होता. 

तिच्या पायगुणामुळेच जणू नवीन नवीन काम मिळायला लागली भाटे कंपनीला. असंच नवीन काम आलं होतं, तेव्हा कांचन त्या बिल्डिंगमधल्या जुन्या ओनर्सना भेटायला गेली होती. त्यांच्या काही लीगल अडचणी सोडवायला, त्यांना मदत करायला ! कांचनचं इम्प्रेशन फार छान पडे लोकांवर ! तिचं मृदु बोलणं, लोकांचं शांतपणे ऐकून घेणं, आणि मग सल्ला देणं आणि लोकांना विचार करायला वेळ देणं !  कांचन त्या लोकांना भेटून आल्यावर तिला त्या बिल्डिंगमधल्या नाडकर्णीकाकांचा फोन आला. “ मिसेस कांचन, आम्ही तुमच्या ऑफिसमध्ये भेटायला येऊ का? आमचं दुसरंच काम आहे ! फ्लॅट संदर्भात नाही.येऊ का? “ त्यांनी कांचनची वेळ ठरवून घेतली आणि ते दोघेही तिला भेटायला आले. अतिशय सुसंस्कृत, सभ्य आणि  श्रीमंतही असं ते जोडपं कांचनला भेटायला आलं. “ कांचनताई, आमचं तुमच्याकडे वेगळंच काम आहे. तुम्ही वकील आहात म्हणून मुद्दाम विचारायला आलोय.” नाडकर्णी काका म्हणाले. 

– क्रमशः भाग पहिला 

© डॉ. ज्योती गोडबोले

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares
image_print