गाडी पार्क करून निघालो तो नेहमीप्रमाणे तुकाराम शिपाई ब्याग घ्यायला धावत आला, त्याला ब्याग देऊन चेंबर मध्ये खुर्चीवर स्थानापन्न होऊन समोरील फाईल्स चाळतो तो तुकाराम वर्दी द्यायला आला, सर… कुणी. नामदेव शेरकि नावाचे पालक भेटू इच्छितात पाठवू का आत.
फायलीतून नजर उंचावून मी केबिन च्या काचातून बेंचावर बसलेल्या त्या पालकांकडे नजर फिरविली त्याच्यासोबत एक स्त्री बसली होती वयावरून ती त्याची मुलगी असावी याचा मी अंदाज बांधला. डोक्याला तान देऊन त्याव्यक्तीला ओळखण्याचा प्रयत्न करू लागलो, कधीतरी त्याला भेटलो असल्याचे जाणवत होते पण ओळख पटत नव्हती….. सर पाठवू का आत तुकाराम च्या आवाजाने मी भानावर आलो. टेबलावरची बेल वाजवुन मी क्लार्क ला बोलावून घेतले व त्या पालकाचे काही कार्यालयीन काम असेल तर करून देण्याचे सांगितले.
थोड्या वेळाने क्लार्क परत आला म्हणाला सर ते तुम्हालाच भेटायचं म्हणतात. काय समस्या असेल बुवा…..थोड्याशा नाखुशिनेच मी पाठवून दे अशी मानेनेच खुण केली. येवू का आत सर…. या आवाजाने मी नजर वर केली एक पन्नाशीच्या वयातील गृहस्थ समोर उभा होता. मळलेला पांढरट पायजामा बंगाली खांद्यावर दुपट्टा बोटबोट दाडी वाढलेली उन्हात काम केल्याने रापलेला चेहरा. प्रयत्न करूनही ओळख पटेना. सोबत असलेल्या मुलीकडे नजर टाकली चेहरा ओळखीचा वाटला पण साडी घालण्याची सवय नसावी हे तिच्या साडी घालण्याच्या पद्धतीवरून दिसून येत होते. मी मानेनेच या अशी खुण केली. आत येताच त्या दोघांनी माझे पाय केंव्हा पकडले कळलच नाही अरे…. अरे…. हे काय लावले, पाया कशाला पडता. म्हणत मी उठून उभा राहिलो. सर तुम्ही मला ओळखले नाही, ती मुलगी म्हणाली सर मी बेलसनी गावची सुषमा, सुषमा शेरकी सर. एका डोळ्याने आंधळी सुषमा सर. आणि आता चकित होण्याची पाळी माझी होती. अरे शूषमा म्हणत मी तिला उचलून उभे केले आता ती माझ्या छातीवर डोके टेकवून रडायला लागली मी तिला शांत हो ग. असा धीर देत तिच्या हातात पाण्याचा ग्लास देत खुर्चीवर बसण्याचा संकेत केला.तिचे वडील भाऊक होऊन पाहत होते त्यांनाही बसायला सांगितले.सुषमा सावरून बोलायला लागली.सर हे अश्रू आनंदाचे होते. सर मी शिक्षिका झाले,माझ्या पायावर उभी झाले.तुमचे स्वप्न पूर्ण केले. तिच्या डोळ्यातून दोन आसवे पुन्हा चमकली. आता मी विचारमग्न झालो आणि सुषमा चा भूतकाळ. डोळ्यासमोरून सरकू लागला…….. जवळपास पाच वर्ष झालीत. त्यावेळेस मी प्राध्यापक होतो तीन दिवसापासून वर्गात मागे बसलेल्या मुलीचे लेक्चर मध्ये लक्ष नसल्याचे जाणवत होते.चवथ्या दिवशी मी तिच्याजवळ जाऊन विचारले,ती काही बोलत नव्हती,काही नाही सर म्हणून अबोल झाली,मी सुध्धा अधिक ताणले नाही. दुपारी अचानक ती तिच्या मैत्रिणीला सोबत घेऊन स्टाफ रूम मध्ये माझ्या समोर येऊन उभी झाली, मी प्रश्नार्थक नजरेने दोघींकडे पाहिले, सुषमाचा एक डोळा पूर्ण पांढरा होता हे मला पहिल्यांदाच दिसले. तिच्या चासम्यामुळे कधी जानवलेच नाही. आता तिची तिची मैत्रीण बोलू लागली. सर हीचा प्रॉब्लेम आहे, मी नजरेनेच काय म्हणून विचारले. आता सुषमा बोलू लागली, सर माझे वडील शिक्षण सोडण्यासाठी मागे लागले आहे,रोज घरी यासाठी भांडण होत आहे.उद्यापासून कॉलेजला जाशील तर कुलूप लावून बंद करून ठेवीन, असा वडिलांनी दंम दिला आहे सर मला शिकायचे आहे पायावर उभे व्हायचे आहे. काय करू सर. ती रडायला लागली. तिला समजावून मी धीर देत सांगितले मी तुझ्या वडिलांशी बोलतो, संध्याकाळी मी तुझ्या वडिलांना भेटायला येतो गावाला,चिंता करू नको. दोघीही मान हलवून परत वर्गात गेल्या.
☆ जीवनरंग ☆ बोध कथा – लबाडीचा व्यवहार ☆ अनुवाद – अरुंधती अजित कुळकर्णी ☆
||कथासरिता||
(मूळ –‘कथाशतकम्’ संस्कृत कथासंग्रह)
?लघु बोध कथा?
कथा १९. लबाडीचा व्यवहार
एकदा एका राजाला तो त्याच्या महालातून बाहेर पडत असताना दारात कोणी एक मनुष्य हातात कोंबडा घेऊन उभा असलेला दिसला. तेव्हा राजाने त्याला “तू कोण आहेस? आणि इथे का उभा आहेस?” असे विचारले. तेव्हा तो म्हणाला, “मी आपल्या नावावर कोंबड्यांच्या व्यापारात हा कोंबडा जिंकलो. तेव्हा त्याला आपल्या चरणांवर अर्पण करण्यास आलो आहे.” “ठीक आहे, कोंबडा आत देऊन ये” असा राजाने त्याला आदेश दिला.
दुसर्या वेळी मेंढा घेऊन तो मनुष्य राजाच्या दारात उभा राहिला. पूर्वीच्याच त्या माणसाला पाहून राजाने “हे काय आणले?” असे विचारले. तेव्हा, “हा बोकड सुद्धा मी आपल्या नावावर जिंकला” असे त्याने कथन केले. राजाने त्याला पूर्वीप्रमाणेच आत येण्यास अनुमती दिली. राजाची अनुमती मिळालेल्या त्या मनुष्याने बोकडाला राजगृही ठेवले व तो निघून गेला.
पुन्हा तिसर्या वेळी काही व्यापाऱ्यांसोबत आलेल्या त्या मनुष्याला पाहून “काय आज काहीही बरोबर न आणता आलास?” असे राजाने विचारले. तेव्हा तो म्हणाला, “महाराज, मी काहीही न घेता आलेलो नाही. आपल्या नावाने लावलेली दोन सहस्र नाणी मी व्यापारात हरलो. ती नाणी दे असे म्हणत या व्यापाऱ्यांनी मला निर्दयपणे पकडले आहे. म्हणून महाराजांजवळ मी त्यांना आणले आहे.” तेव्हा राजाने त्याच्या कोषागारातून तों हजार नाणी त्याला आणून दिली व ‘यापुढे माझ्या नावावर व्यापार करू नकोस’ असे त्याला बजावून पाठवून दिले.
तात्पर्य – लबाडीचा व्यवहार जास्त काळ टिकू शकत नाही. तो उघडकीस येतोच..
☆ जीवनरंग ☆ प्यादं….भाग -3 ☆ श्रीमती मीनाक्षी सरदेसाई☆
भारतीला मुलाला संभाळूनच अभ्यास करावा लागणार म्हटल्यावर आम्ही शिक्षकांनी दुसरे उपाय काढले. आठवड्यातले तीन दिवस इंग्रजी, गणित, सायन्सचे तास लागून होते. तेव्हढ्या तासाना भारतीने यायचं, मराठी शाळा दुपारी सुटायची. तिथल्या दोन तीन मुली बाळाला खेळवायला हौशीने तयार झाल्या. जादा तास शाळेच्या वेळाच्या बाहेर होते. तेव्हा भारतीची लहान भावंडं बाळाला संभाळणार. भारतीने दिवसभराचा अभ्यास मुलींकडून घ्यायचा, बाळ झोपलेल्या वेळेत तो करायचा. तिला ‘अपेक्षित’ ची गाईडं दिली. तिच्या कडून फक्त काठावर पासिंगची अपेक्षा ठेवली. हे सर्व प्रयत्न परिक्षार्थी होते खरे, पण त्या पास होण्यामुळेच तिचा पुढचा मार्ग खुला होणार होता.आम्ही सर्वानी चंग बांधला की भारतीला दहावीतून बाहेर काढायची. भारतीच्या वडिलांना इतका सगळा पत्ता लागू द्यायचा नव्हता. कारण त्यांना मुलींच्या शिक्षणासाठी खटाटोप करणं मान्यच नव्हतं. ते दिवसभर घरी नसायचेच. आई आमच्या बाजूला होती. असा अभ्यास करणं भारतीला खूप अवघड होतं, पण ती प्रयत्नाला लागली होती. तिच्या घटक चाचण्या, सहामाही झाली. वर्गातल्या बऱ्याच मुलांसारखे तिला इंग्रजी, गणितलाच फक्त मार्क कमी पडले. शाळेच्या चांगल्या निकालाला भारतीच्या पासिंगचा उपयोग ग्रहीत धरून मुख्याध्यापकांनीही आम्हाला सहकार्य दिलं. फॉर्मचे पैसे सगळ्या शिक्षकांनी भरले म्हटल्यावर वडिलांनीही फार खळखळ केली नाही.
पैसा एव्हढाच त्यांचा प्रॉब्लेम होता. तरीही त्यांना अंधारात ठेवणं बरोबर नाही असं सगळ्यांचं मत पडलं. परिक्षेच्या वेळी अडमडायला नकोत.
मी भारतीचे वडील घरी असतील अशा वेळीच तिच्याकडे गेले. म्हटलं, नीट समजावून सांगू म्हणजे ते ऐकतील. ते काही राक्षस नाहीत.
सगळं घर सामसूम होतं. वडील घरात नव्हतेच. आई होती. भारतीचे नाक डोळे रडून लाल झाले होते. चेहरा सुजला होता. मी तिच्या पाठीवर हात ठेवल्यावर तिला हुंदकाच फुटला.
‘काय झालं’मी विचारलं. तिला बोलताच येईना. आईच म्हणाली, “बाईनू, लय गुत्ता झालाय बगा. अनिताची सासू म्हनतिया, ‘भारतीला सून करून घ्येतो, म्हंजी पोराचंबी ती करील नि तुम्हास्नीबी तिच्या लगिनाचं बघाय नको. भारतीचा बा तयार झालाय. म्हनतोय, लग्नाचा खरचं वाचला. उरावरचं वझं उतरेल.एकदा त्यांच्या मनाने घ्येतलं की न्हाई ऐकायचा. जावयाकडून पैसं बी घ्येतलं असतील. तसंच काही तरी दिसतय्. बाईनू, तुमी ह्यात पडू नगासा. तुमास्नी फुकटचा तरास व्हील.”
भारतीच शिक्षण ही आता हाताबाहेरची गोष्ट झाली होती. अज्ञानाच्या, दारिद्रयाच्या काळ्याकुट्ट अंधारात आपली मिणमिणती दिवली विझून जाणार हे आम्ही ओळखलं.
मोडक्या चुलीच्या जागी नवी चूल बसवतात तशी भारती आपल्या बहिणीच्या संसारात जाऊन बसणार होती. सोपा हिशोब होता. भारती म्हणजे एक प्यादं होतं. त्याला कुठेही, कसंही सरकवलं तरी चालणार होतं.
मी तिच्या पाठीवर हात ठेवला. म्हटलं ‘रडू नकोस. बाळाला नीट वाढव. ते मोठं झालं की तुझ्या शिक्षणाचं बघू.’
बऱ्याच वर्षानी भारती ए. डी. ई. आय होऊन शाळा तपासायला आली. मधल्या काळातली सगळी हकिगत तिने सांगितली. नवऱ्याला पुण्याला नोकरी मिळाली होती. बाळाला संभाळून तिने शिक्षण चालू केलं होतं. नोकरी मिळवली होती. सगळ्या वाटचालीत नवऱ्याने तिला साथ दिली होती. प्यादं पुढे पुढे सरकलं होतं. त्याने बरीच मजल मारली होती.
शाळेतले संस्कार फुकट जात नाहीत, ते टिकतात, बहरतात सुध्दा.
समाप्त.
श्रीमती मीनाक्षी सरदेसाई
मो. – 8806955070
≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈
रणरणत्या मे महिन्यात मधल्या सुट्टीत एक महत्वाचे काम असल्याने मी चालत चालत बाहेर पडलो होतो. एक दहा बारा वर्षाचा मुलगा अनवाणी पायाने चाललेला पाहून त्याला म्हटले, “चल बाळा, तुला आपण तुझ्या मापाची चप्पल किंवा स्लीपर, तुझ्या पसंतीने जवळच असलेल्या दुकानातून घेऊया.” क्षणभराचीही उसंत न घेता तो म्हणाला, “काका, नको मला चप्पल किंवा स्लिपर, पण आपुलकीने विचारल्याबद्दल आभारी आहे. मला आत्तापासून याची सवय करुन घ्यावी लागेल म्हणजे भविष्यात काहीच जड जाणार नाही.” त्याच्या उत्तराने मी अचंबित झालो, मला त्याच्या रुपात बालगुरुच भेटला.
☆ विविधा ☆ लोकसाहित्य – राजस बाळराजा – भाग – 2 ☆ श्रीमती उज्ज्वला केळकर☆
बाळ आणखी मोठं होतं. दूरवर शहरात जाऊ लागतं, तरी आईच्या दृष्टीने तो तान्हं बाळच. ‘काई गावाला ग गेलेल्याची।. वाट ग बघितो दारातून। काई ग माझा ह्यो तान्हा बाळ। हिरा ग झळकतो शहरातून।।’ आशा या बाळाचं कौतुक करताना, त्याच्या सामर्थ्याबद्दल सांगताना ती म्हणते, ‘ल्क्ष्मीबाईनं लई फैलाव मांडिला। बाळांनी माझ्या पैसा राउळी बांधिला।।’ ज्या ल्क्ष्मीचा डंका पिटला जातोय, तिचं देऊळ माझ्या बाळानं पैसे घालून बांधलय. इथे कुठे कुठे बाळाच्याऐवजी बंधुजीदेखील म्हंटलेलं दिसतं. (म्हणणारी आपल्या भावनेनुसार मूळ ओवीत असा बादल करत जाते. लाकसाहित्य परिवर्तनशील असतं, ते असं.) आशा आपल्या कौतुकाच्या, अपूर्वाईच्या बाळासाठी ती सूर्य नारायणाकडे औक्ष मागते.
‘सकाळी उठूनी हात मी जोडिते सूर्याला। बाळाला माझ्या औक (औक्ष) मागते हिर्याला।।’ कुठे कुठे बाळाऐवजी बंधूला, सख्याला किंवा चुड्याला म्हणजेच भ्रताराला असा पाठभेद आहे. कुठे कुठे भावाला औक्ष आणि चुड्याला चंद्रबळ (सामर्थ्य) असंही म्हंटलय.
मुलाप्रमाणेच मुलीचही कौतुक आईनं केलय. मुलीच्या पोटात माया असते, असं ती म्हणते. मुलगा म्हणजे दारचा मोगरा आणि मुलगी म्हणजे दारची जाई, असं ती सांगते. कुणी विचारतं, बाई तुला मुलं किती? ती उत्तरते, ‘एक गं पुतळी दोन मोती।।’ मुलगी झाली म्हणून कुणी हिणवलंच तर ती म्हणते, ‘लेकापरिस लेक कशास व्हावी उणी। एका खाणीतली रत्न दोन्ही।। बाळी खेळून आली. तिचं कौतुकानं वर्णन करत ती म्हणते, ‘काई वाळं नि गं साखळयांनं। माझी पायरी दणाणली। काई गं बंटुली माझी बाळ। बाळ खेळून गं आली।।’ आपली मुलगी म्हणजे नक्षत्रच. चांदणीसारखी सुंदर असेही उल्लेख अनेक ओव्यातून आलेले आहेत.
कधी कुणी मुलगी झाली, म्हणून हिरमुसली, तर तिची समजूत घालताना दुसरी एखादी म्हणते,
‘काई लेकीच्या ग आई। नको म्हणूस ग हलईकी। काई ग लेकाच्या आईला। कुणी केलीया ग पालखी।।’ तिला सुचवायचं आहे, मुलाच्या आईची स्थिती काय मुलीच्या आईपेक्षा वेगळी थोडीच आहे?
आईचे मुलावर किती प्रेम, किती माया, त्याच्यासाठी जीवदेखील द्यायची तिची तयारी. याबद्दलची मुलाला काळीज कापून देणार्या आईबद्दलची लोककथा सर्वांना माहीत आहे. असंच एक व्यावहारिक मन हेलावून टाकणारं सत्य एका ओवीतून व्यक्त झालय. केळीचा घड काढताना आधी केळ तोडली जाते , ही वस्तुस्थिती. ती ओवीत आशा शब्दात प्रकट होते,
‘काई जल्मानि ग मंदी… केळी गं बाईचा जन्म न्यारा… काई पोटीच्या बाळापाई… आधी ग देती आपला गळा…’
वरील ओव्यातून आलेले ‘काई’, ‘गं’ किंवा अन्य काही ओव्यातून आलेले ‘बाळयाचा’ किंवा ‘बापयाचा’ मधील ‘या’ किंवा ‘अग’ यासारख्या शब्दांना विशिष्ट अर्थ नसतो. हे शब्द सूर धरण्यासाठी, लयीसाठी त्यात येतात.
बाळाबद्दल आई अगदी भरभरून बोलते. विशेष म्हणजे त्यात कुठेही तक्रारीचा सूर नाही की नकारात्मक भाव नाही. इतर नात्याच्या वर्णनात कधी कधी नापसंतीचा सूर दिसतो. पण इथे मात्र बाळ कसंही असलं, किरकिरं, अशक्त, रोगट, रडवं असलं, व्रात्य, खोडकर असलं, तरी त्याचं कौतुकच केलेलं दिसतं. बाळाचं कौतुक करणार्या ओव्या पूर्वी बायका चढाओढीनं म्हणायच्या, हल्ली अंताक्षरी गायली जाते, तशा.
☆ जीवनरंग ☆ प्यादं….भाग -2 ☆ श्रीमती मीनाक्षी सरदेसाई☆
झोपताना पाचवीपासूनची भारती माझ्या मनात तरळत होती.तिची तीन भावंडं आमच्या शाळेत होती. अनिता, भारती, कमल नि धाकटा उदय.सगळी मुलं हुशार होती नि शिक्षकांची आवडती पण. वडील शेतमजुरी करणारे, आई विटांच्या कारखान्यात विटा उचलायला जायची. मुली सुट्टीच्या दिवशी आईबरोबर कामाला जायच्या. भांडी घासायलाही जायची आई.
‘दोन तास लागतात भांडी घासायला, पण आई म्हनते, ‘जेवायला ताटं वाडून देत्यात दोन, दोन. म्हनून परवडतय. ‘ दुसऱ्याच्या अन्नावर पोसले ल्या ह्या मुली, पण गटगुटीत होत्या. काळ्या पण तेजस्वी.दात पांढरे शूभ्र, केस काळेभोर, डोळे चमकदार.
भारतीची बुध्दीमत्तेची चमक शिकवताना जाणवायची. तिच्या अशुध्द बोलण्यातूनही तिची समज लक्षात यायची. शिरिष पैंचा पप्पांबद्दलचा धडा वाचताना ती गालात हसायची. ‘गुलमोहोर ‘वाचताना भरून यायची, गणित सोडवताना डोळे मोठे करून विचार करायची, इतिहास समरसून ऐकायची. अभ्यासाची तळमळ इतकी की, मधल्या सुट्टीत उद्यांचा अभ्यास पुरा करताना दिसायची. आपल्याला घरी काम असतं त्यामुळे इतर मुलींसारखा वेळ फुकट घालवता नये हा तिचा सूज्ञपणा बघून कौतुक वाटायचं. अशा भारतीचं शिक्षण बंद व्हायची वेळ आलेली.अडचण अगदी विचित्र होती. घरचं अठराविश्व दारिद्रय, बहिणीचं अवेळी मरणं, नि बाळाचं संगोपन हे सगळं नेमक शिकायची खूप हौस असलेल्या भारतीच्याच वाट्याला का यावं?भारती इतकी मोठी नव्हती करखीी ह्या अडचणीतून मार्ग काढून शिकेल.आपणच काहीतरी करायला हवं. मला चैन पडेना. मार्ग सुचेना. जो सुचे त्यांत अनेक अडथळे होते. प्रश्न मला एकटीला सोडवता आला नसता. अनेकांना समजावून सांगायला हवं होतं.बोलणी खायला लागली असती.प्रयत्न करून, अडथळे पार करून
भारतीचं शिक्षण सुरु झालं, पण ती पास झाली नाही तर सगळं मुसळ केरात.वाटलं, जाऊदे. तिचं नशीब तिच्याबरोबर. आपल्या डोळ्यासमोर ही मुलगी आहे म्हणून, अशा कितीतरी मुलीना आवड असून शिक्षण सोडावं लागतं त्याला आपण काय करतो.पण पुन्हा भारतीचे केविलवाणे शब्द कानात भुणभुण करीत होते.
‘मला लई म्हंजे लई वाटतंय, दहावी नि फुढबी शिकावं मग तुम्ही म्हणता तसं डीएड व्हावं, आपल्याच शाळंत नोकरी मिळेल.राखीव म्हटल्यावर एडमिशन, नोकरी ह्यात अडचण येनार न्हाई. न्हवं का बाई?’
मीच तिच्या समोर अनेक वेळा रंगवलेली स्वप्नं ती मला ऐकवत होती. पण त्या प्रकाशमय शूभ्र चित्रावर एक अटळ असा काळा बोळा फिरला होता. त्यात दोष तर कोणाचाच नव्हता. आईवडिलांना कामावर जायलाच हवं होतं,दोन महिन्याच्या बाळाला कोणीतरी संभाळायला पाहिजेच. भारतीची धाकटी भावंडं लहानच होती, शेजारघरंही ‘हातावर पोट’असणारी.
मी पुन्हा भारतीकडे गेले तेव्हा तिला म्हटलं’अग भारती, अनिताचं सासर खातंपितं आहे ना?बायका कामाला नाही जात तिथल्या. सासू नाही सांभाळणार बाळाला?’
‘बरोबर आहे तुमचं. पण मग भारतीचं शिक्षण?बंदच होणार.’
‘बाई,तुमास्नी माझ्या बद्दल येव्हढ वाटतय खरं, पर आमचा बाबा काय म्हनतो,’आता शिकुन तर काय मोठी धन लावनार हाय पोरगी घरच्या अडचनीपेक्षा पोरीच्या शिक्षनाला म्हत्व देऊन आमास्नी कुटं झेंडे लावायचेत!’
☆ जीवनरंग ☆ प्यादं….भाग -1 ☆ श्रीमती मीनाक्षी सरदेसाई☆
दहावीचा नवा वर्ग. मी हजेरी घेतली. गैरहजर मुलांची नावं लक्षपूर्वक पाहिली. २० जून उगवला तरी भारती भोसले ही मुलगी शाळेत आली नव्हती. ‘भारतीच्या शेजारी कोण रहाते ग?’ मी मुलींना विचारलं.
‘ह्यी रहाते बाई.’
ह्यी म्हणायची मंगल उभी राहिली.
अग, ह्या भारतीला काही आहे का काळजी? दहावीचं वर्ष आहे, शाळा सुरु होऊन दहा दिवस झाले, पहिल्या दिवसापासूनच शिकवायला सुरुवात झालीय, मागे पडलेला अभ्यास केव्हा भरून काढणार ती?जबाबदारीची जाणीव आहे की नाही तिला?’
मी तडातडा बोलत होते. जशी काही भारतीच माझ्यासमोर उभी होती.
मी हबकून खुर्चीवर बसले. वारलेली अनिता दोन वर्षांपूर्वींची आमची विद्यार्थिनीच होती. कशी बशी दहावी झाली नि तिचं लग्न झालं होतं. ती एव्हढीशी कोवळी पोरगी चक्क वारलीच?
‘अग, अशी कशी वारली? कुठल्या हास्पिटलमध्ये होती?काय झालं तरी काय?’ ‘तिला ताप आला नि डोक्यात गेला.’ एकेक करीत सगळ्याच मुली बोलायला लागल्या. अनिता कशी वारली ते सांगायला लागल्या. मला समजून घ्यायचं होतं पण बाळंतपणाचा विषय म्हटल्यावर वर्गातल्या मुलांनी माना खाली घातल्या होत्या. ‘वर्गात बाई कसला तरीच विषय बोलत्यात ‘असंहोऊ नये म्हणून मी माझी अनिताबद्दलची हुरहुर मनात दाबून ठेवली. ३५ मिनिटांचा वळ अभ्यासाशिवाय फुकट (?) जाऊ नये म्हणून मी एक ठोकळा शिक्षिका झाले. फळा पुसत मी म्हटलं, ‘बरं, भारतीला म्हणावं, वाईट झालं खरं, पण आता काय करणार? गेलेलं माणूस काय परत येणारेय का? आपलं दुःखं बाजूला ठेऊन रोजचे व्यवहार पार पाडायलाच हवेत ना?शाळेत ये म्हणावं म्हणजे विसरायला होईल.’
‘पर बाई अनिताचं मूल जगलंय् नि ते संभाळायला भारतीला घरी रहायला पाहिजे. ‘
बापरे! आता मात्र अनिताचं मरणं, बाळाचं जगणं, नि भारतीचं शाळेत न येणं माझ्या मनात खोलवर शिरलं. माझा थंडपणा मलाच जाणवला. शाळा सुटल्यावर भारतीच्या घरी गेले. घर म्हणजे एक दहा फुटाची खोली. अंगण मात्र सारवलेलं, एका काळयामेळ्या फडक्यात एक तान्हं मूल आ ऊ करीत पडलेलं होतं. शेजारची एक शेंबडी पोरगी बाळाला खुळखुळा वाजवून खेळवत होती.
‘भारती, काय करतेयस ग?’मी हाक मारीत दारातून आत गेले.
भारती परकराचा ओचा सोडीत, त्याला हात पुसतच बाहेर आली.
‘अगबाई! बाई तुम्ही?’ असं म्हणत तिने मला बसायला पाट दिला. चुलीतला धुरकटलेला जाळ पेटवून ती आली. तिने बाळाला मांडीवर घेतलं नि ती त्याला थोपटत बसली. बाळ गाढ झोपलं.
मैदानावर खो खो खेळताना चपळाईने पळणाऱ्या भारतीचं ते मोठं आईपण बघून माझा जीव भरून आला. काय बोलाव कळेचना.
रडवेल्या स्वरात तीच मग म्हणाली.’बाई, कळलं ना तुम्हास्नी सगळं?
माझी शाळा आता बंदच झाली म्हणायची. मला लई म्हंजे लई वाटतय् शाळेत यावं, पर ह्याला कुटं ठ्येवनार?त्याची आई आमच्या पदरात टाकून गेली, बोळ्याने दूध घालावं लागत हुतं, आता चमच्यानी पितय. बाटली आनायचीय. ‘पं
भारती प्रौढ बाईसारखी बोलत होती. तिला खूप सांगायचं होतं, आपल्यासाठी बाई घरी आल्या याची अपूर्वाई वाटत होती. आपल्या शिक्षणाचं काय करायचं याची काळजी ऐकवायची होती. तिने मग माझ्यासाठी चहा ठेवला. ‘बाई चालल न्हव बिनदुधाचा? दूध न्हाई.’
‘चालेल ग. पण कशाला चहा?’ असं म्हणत मी कडू चहाचा घोट गिळला. नि थातूरमातूर काही तरी सांगून मी घरी आले.
क्रमशः…
श्रीमती मीनाक्षी सरदेसाई
मो. – 8806955070
≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈
(पूर्वसूत्र:- ती संपूर्ण रात्र तिने टकटकीत जागून काढली.दुसऱ्या दिवशी ऑफिसमध्ये जाण्यासाठी मुलगा घराबाहेर पडला, त्याच्या पाठोपाठ फाटक्या पिशवीत जुनेरं कोंबून हिने बाहेरचा रस्ता धरलान्.. आपल्या सुनेचा निरोपसुद्धा न घेता.)
एकटेपणाचा बाऊ न करता तिने पुन्हा पदर खोचला. पुन्हा पोळपाट-लाटणं हातात घेतलं. पण ते हात आता पूर्वीसारखे खंबीर नव्हते. थरथरत होते. मग गरजेपोटी कधी कुणी तिला कामावर ठेवून घेत राहिलं. ती राहिली. चुकतमाकत स्वैपाक करू लागली. पण पूर्वीची चवीची भट्टी पुन्हा कधी जमलीच नाही. मग कधी बोलणी बसायची. कामं सुटायची किं पुन्हा दुसरं घर. ती फिरत राहिली. फिरत फिरत इथं आली. या समोरच्या घरी. तिने पूर्वी जोडून ठेवलेल्या. पानसे वकिलांच्या या घरची बाळंतपणं, वकिलीण बाईंची आणि त्यांच्या लेकीसुनांची सुद्धा कधीकाळी हिनेच केलेली. हे घर तिला पुन्हा भेटलं आणि एक दिवस तिच्या मुलाला पानसे वकिलांचं पत्र आलं….
‘तुझी आई आता आमच्या घरी आहे. कामाला नव्हे,रहायला. जेवायला. कारण कामं करण्याची शक्ती आता तिच्या जवळ नाहीये. ती असती तरी तिने कामं का आणि किती दिवस करायची हे प्रश्न आहेतच. तू शिकलास. मोठा झालास. बऱ्यापैकी पैसे मिळवतोयस. हे सगळं तुझ्या आईने आपल्या घामाचं आणि कष्टांचं खत घालून पिकवलंय. तिला त्या खताची किंमत हवीय. होय. तुझ्याकडून पोटगी. का? दचकलास? मी वकील म्हणून तिने मला शब्द टाकलाय. मी तिचं वकीलपत्र घेतलंय. एका पैशाचीही अपेक्षा न ठेवता. एक आई आपल्या मुलाविरुध्द कोर्टात केस गुदरतेय आणि तेही त्याच्यासाठी आयुष्यभर केलेल्या कष्टांचे पैसे उतारवयात कष्ट न करता पोटगीरूपाने परतफेड म्हणून मिळावेत यासाठी, हेच मला नवीन होतं. आणि एक आव्हानसुद्धा. मी ते आव्हान स्वीकारायचं ठरवलंय. तू तिला न्याय देऊ शकला नाहीयस. न्यायदेवता काय करते पाहू. ती आंधळी जरुर आहे, पण तुझ्यासारखी निगरगट्ट नाहीये. तुझ्या आईच्या चरितार्थासाठी आवश्यक ती रक्कम तू तिला आमरण द्यावीस म्हणून ही नोटीस तुला विचारासाठी योग्य वेळ द्यायचा या सद् भावनेने या खाजगी पत्राद्वारेच पाठवतोय. योग्य निर्णय घे.’
पत्र त्यानं वाचलं.फाडून टाकलं. पुढे रितसर नोटीस आली. केस कोर्टात उभी राहिली. जगावेगळी म्हणून खूप गाजली सुद्धा. पानसेवकिलानी तिचं वकिलपत्र घेतलं तेव्हाच खरं तर निकाल निश्चित होता. तोच लागला. गेलं वर्षभर दरमहा नियमित पैसे पाठवताना आईने आयुष्यभर पै पै साठी केलेले कष्ट आता त्याला स्वच्छ दिसतायत. सूनसुद्धा सायीसारखी मऊ झाली. म्हणाली .. “यापेक्षा त्यांना मूला-सुनेचं प्रेम देणंच जास्त स्वस्त पडेल आपल्याला..”
त्यालाही ते पटलंय. तो तिला न्यायला आलाय. होय. मीच. अचानक आलेला प्रेमाचा उमाळाच फक्त माझ्या मनात आहे असं मी म्हणत नाही. त्याबरोबरच थोडा व्यवहारही आहे.पानसेवकिलानाच मी म्हटलं होतं, तुम्हीच सांगा तिला. म्हणाले…,
“जा असं मी तिला कुठल्या तोंडाने सांगू? मी तिला न्याय मिळवून दिलाय.तिच्यावर अन्याय कसा करू!”
त्यांचंही बरोबर आहे. आता आत डोकवायला पाहिजे मलाच. मन तिथं केव्हाच जाऊन पोचलंय. पावलंच घुटमळतायत.त्यांना वाटतंय, ‘आपल्या चेहऱ्यावरचा व्यवहार तिला पुसटसा जरी दिसला तर! आणि समजा.. नाही दिसला,तरी.. ती.. येईल? तुम्हीच जाताय का?डोकावताय त्या घरी? जा आणि सांगा तिला,..
(एकटेपण दु:खदायक असणार हे माहित असूनही ते टाळण्यासाठी स्वतःचा स्वाभिमान गहाण टाकायला ती तयार नव्हती.अशाच एका जगावेगळ्या गलितगात्र तरीही स्वाभिमानी आईची ही कथा…..)
जा. त्या घरात डोकावून या. आपल्या संसारासाठी, मुलासाठी रक्ताचं पाणी केलेली, थकली भागलेली एक म्हातारी आई आत आहे….! आलात डोकावून..?
मलाही जायचंय. मन तिथं केव्हाच जाऊन पोहोचलंय. पावलंच घुटमळतायत. सारखी आठवतीय, तिच्या मुलाचं लग्न ठरलं होतं तेव्हाची ती.थकल्या शरीरानं पण प्रसन्न मनानं पदर खोचून उभी राहिली होती. तिच्या संसाराचं स्वप्न विरता विरताच पोराच्या सुखी संसाराचं स्वप्न तिच्या म्हातार्या नजरेसमोर तरळलेलं होतं.
तीन मुलींच्या पाठीवरचा वाचलेला असा हा एकुलता एक मुलगा. तिन्ही मुलींनी उघडण्या पूर्वीच आपले डोळे मिटलेले. आल्या,आणि आईच्या काळजाचा एकेक लचका तोडून आल्या पावलीच निघून गेल्या. तेव्हापासून हिचे डोळे पाझरतच राहिलेत. कधी त्या जखमांची आठवण म्हणून, कधी पोराला दुखलं खुपलं म्हणून, पुढे नवरा आजारी पडला म्हणून, नंतर तो गेला म्हणून आणि नंतर नंतर हा सगळा भूतकाळ आठवूनच.
मुलाचं लग्न ठरलं, तेव्हा त्या क्षणापर्यंत अप्राप्य वाटणारी तृप्ततेची एक जाणिव तिच्या मनाला स्पर्शून गेली.. पण.. ओझरतीच..! लक्ष्मी घरी आली, पण समाधानाने डोळे मिटावेत एवढी उसंत कांहीं तिला मिळालीच नाही. लक्ष्मी घरी आली तेव्हा तिला वाटलं होतं.. आता मांडीवर नातवंड खेळेल.. सुख ओसंडून वाहील.. घर हसेल. पण.. तिचं सुखच हिरमुसलं.
माप ओलांडून सून घरी आली तेव्हा तिला एकदा डोळे भरून पहावी म्हणून हिने नजर वर उचलली, तेव्हा सुनेच्या गोऱ्यापान कपाळावर एक सुक्ष्मशी आठी होती. होती सुक्ष्मशीच..पण ती हिच्या म्हाताऱ्या नजरेत सुध्दा आरपार घुसली. मन थकलं, तशी शरीराने कुरकुर सुरु केली. पण अंथरूण धरलं तर सुनेच्या कपाळावरचं आठ्यांचं जाळं वाढेल म्हणून ती उभीच राहिली. थकलीभागली, पण झोपली नाही….
आलात डोकावून? कशी आहे हो ती? आहे एकटीच पण आहे कशी? हे प्रश्न कधी हवे तेव्हा, हवे त्यावेळी डोकावलेच नव्हते त्याच्या मनात.मुलाच्या. लक्ष्मी हसली तो खुलायचा. ती रुसली तो मलुलायचा. घरी आलेली ती नाजूक गोरटेली मोहाचं झाडच बनली होती जणू. ही फक्त पहात होती. आपला मुलगा आणि त्याची सावली यातला फरक तिला नेमका समजला. लग्न झालं तेव्हापासून तो हिच्यापुरता मेलाच होता. जिवंत होती ती त्याची सावली. सावली.. पण आपल्याअस्तित्वाने चटकेच देणारी..!
पहिल्यापासून अबोलच तो. बोलायचा फार कमी. हवं-नको एवढंच. आता तर तेही नव्हतं. आयुष्यभर काबाडकष्ट करून आईच्या अंगावरचं मांस सगळं झडलंच होतं.. पण तिच्या हाडांची कुरकुर त्याला कधी जाणवलीच नाही. बाहेरची काम बंद केली होती पण घटत्या शक्ती न् उतरत्या वयाच्या तुलनेत घरची कामं दुपटीने वाढली होती. मूर्तिमंत सोशिकताच ती. बोलली काहीच नाही. गप्प बसली.
घरात खाणारी तोंडं ही तीनच. पैसा उदंड नव्हता पण कमी नव्हताच. खरेदी, साड्या, सिनेमे सगळंच तर सुरू होतं. सिगारेटचा धूर तर सतत दरवळलेलाच असायचा. काटकसर ओढाताण कुठे दिसत नव्हतीच आणि या कशाचबद्दल तिची तक्रारही नव्हती. पण हिच्या गुडघ्यावर खिसलेलं पातळ खूप दिवस उलटून गेल्यानंतरसुद्धा जेव्हा त्या दोघांच्या नजरपट्टीत आलं नाही तेव्हा हिच्या मनावर पहिला ओरखडा उठला. कुणाची दृष्ट लागावी एवढं खाणं नव्हतंच हिचं. पण भूक मारायचं औषध म्हणून अंगी मूरवलेली चहाची सवय मात्र अद्याप सुटलेली नव्हती.एक दिवस पहाटे पहाटे डोळा लागला तो सकाळी उशिरा उघडला. पाहिलंन् तर दोघांचा चहा झालेला. चूळ भरुन पदराला हात पुसत ती आंत आली तेव्हा हिच्या चहाचं आधण सूनेनं आधीच स्टोव्हवर चढवलेलं होतं. हिने पुढे होऊन दूध कपात घेऊन चहा गाळलान् तर गाळणं पूर्ण भरून वर चोथा उरलाच. इथं दुसरा ओरखडा उठला. आधीच अधू झालेलं मन रक्तबंबाळ झालं. पोराला हाक मारलीन् तीसुद्धा रडवेली.
“एका कपभर चहालासुद्धा महाग झाले कां रे मी?”
“काय झालं?”
“बघितलास हा चहा? उरलेल्या चौथ्यात उकळवून ठेवलाय. एवढं दारिद्र्य आलंय का रे आपल्याला? जड झालेय मी तुम्हाला?”
तो गप्प. एक बारीकशी आठी कपाळावर घेऊन त्याने आपल्या बायकोकडे पाहिलंन्. ती उठली. तरातरा पुढे झाली. सासूनं गाळून ठेवलेला चहा एका घोटात पिऊन टाकलान् आणि तोंड सोडलंन्.
“विष देऊन मारत नव्हते मी तुम्हाला. चहाच होता तो. पटलं ना आता? एक गोष्ट माझी मनाला येईल तर शपथ. आपापलं काही करायचं बळ नाहीय अंगात तर एवढं. ते असतं तर रोज खेटरानंच पूजा केली असतीत माझी. आजवरचं आयुष्य काय अमृत पिऊन काढलं होतंत? या चहाला नाकं मुरडायला? बोलली आणि ढसाढसा रडायला लागली. आता खरं तर रडायचं हिनं पण ही रडणंच विसरली. मुलगा शुंभासारखा उभाच होता. ही जागची उठली. आत जाऊन पडून राहिली. चहा नाही,पाणी नाही, जेवण नाही.. अख्खा दिवस मुलानं बायकोची समजूत काढण्यात घालवला आणि तिन्हीसांजेला तो आईकडे डोकावला.
“आई, तू हे काय चालवलंयस?”
“मी चालवलंय?”
“हे बघ, मला घरी शांतता हवीय. काहीही काबाडकष्ट न करता तुला वेळेवारी दोन घास मिळतायत ना? तरीही तू अशी का वागतेयस? थोडंसं सबुरीनं घेतलंस तर कांही बिघडेल?”
उपाशी पोटी मुलाच्या तोंडून दोन वेळच्या घासांचं अप्रूप तिनं ऐकलं आणि ती चवताळून ताडकन् उठली. पण तेवढ्या श्रमानेही धपापली.
“सबुरीनं घेऊ म्हणजे काय करू रे? तुम्ही जगवाल तशी जगू? मन मारून जिवंत राहू? अरे, ती सून आहे माझी. कुणी वैरीण नव्हेs. आजवर वाकडा शब्द वैऱ्यालासुध्दा कधी ऐकवला नव्हता रे मी. स्वतःच्या संसाराकरता हातात पोळपाट लाटणं घेऊन मी चार घरं फिरले त्याची हिला लाज वाटतेय होय? का माझ्या पिकल्या केसांची न् या वाळक्या शरीराची?”
“आई..पण..”
“हे बघ, मला वेळेवर दोन घास नकोत पण प्रेमाचे दोन शब्द तरी द्यायचेत.मी काबाडकष्ट केले ते मला दोन घास मिळावेत म्हणून नव्हतेच रे. ते तर मिळालेसुध्दा नाहीत कितींदा तरी. कारण मिळालेल्या एका घासातला घास काढून तो मी आधी तुला भरवला होता रे. वाढवला, लहानाचा मोठा केला..”
ऐकलं आणि सून तीरा सारखी आत घुसली.
“हे बघा, पोराला वाढवलं, मोठ्ठ केलं ते तुमच्याच ना? उपकार केलेत? आम्हीसुद्धा आमची पोरं वाढवणारंच आहोत. उकिरड्यावर नेऊन नाही टाकणार..”
“सुनबाई, बोललीस? भरुन पावले. तुला मी डोळ्यांसमोर नकोय हेच वाकड्या वाटेने आज सांगितलंस? पण एक लक्षात ठेव. स्वयंपाकांच्या घरातूनसुद्धा आज पर्यंत फक्त मानच घेतलाय मी. अपमानाचं हे असलं जळजळीत विष तिथंसुद्धा मला कधी कुणी वाढलं नव्हतं आजपर्यंत.मी माझ्या पोराला वाढवलं. मोठं केलं. उपकार नाही केले. कर्तव्यच केलं. खरं आहे तुझं. पण त्या कर्तव्याची दुसरी बाजू तुम्ही टाळताय. तुम्ही माझं देणं नाकारताय. तुमचा संसार तुम्हाला लखलाभ. मला एक खोली घेऊन द्या. कुडीत जीव आहे तोपर्यंत चार पैसे तिथं पाठवा. उपकार म्हणून नकोsत. केलेल्या कर्तव्याची परतफेड म्हणूनच”
“होs पाठवतो नाs. खाण नाहीये कां इथं पैशांची..! हंडा सापडलाय आम्हाला गुप्तधनाचा. तो उपसतो आणि पाठवतो बरंs पाठवतो.”
सून तणतणत राहिली. सिगारेटचा धूर हवेत सोडत मुलगा शून्यात पहात राहिला. ती संपूर्ण रात्र तिने टकटकीत जागून काढली. दुसऱ्या दिवशी ऑफिसमध्ये जाण्यासाठी मुलगा घराबाहेर पडला, त्याच्या पाठोपाठ फाटक्या पिशवीत जुनेरं कोंबून हिने बाहेरचा रस्ता धरलान्..आपल्या सुनेचा निरोपसुद्धा न घेता. एकटेपणाचा बाऊ न करता तिने पुन्हा पदर खोचला. पुन्हा पोळपाट-लाटणं हातात घेतलं. पण ते हात आता पूर्वीसारखे खंबीर नव्हते. थरथरत होते. मग गरजेपोटी कधी कुणी तिला कामावर ठेवून घेत राहिलं. ती राहिली. चुकतमाकत स्वैपाक करू लागली. पण पूर्वीची चवीची भट्टी पुन्हा कधी जमलीच नाही. मग कधी बोलणी बसायची. कामं सुटायची किं पुन्हा दुसरं घर. ती फिरत राहिली. फिरत फिरत इथं आली. या समोरच्या घरी. तिने पूर्वी जोडून ठेवलेल्या.
दर पंधरा दिवसांनी डॉक्टर त्याचे चेकिंग करत होते. त्याचा आता छान प्रतिसाद मिळत होते. त्याचं डोकं आता दुखत नव्हते व जखमही बरी होत आली.असंच वर्ष पार पडलं आणि मग त्याला डॉक्टरांनी दहावीच्या परिक्षेला बसण्याची परवानगी दिली. त्याची शाळाही नीट सुरू झाली.
त्याने मनापासून अभ्यास केला आणि तो परिक्षेला बसला. त्याला ८८टक्के मार्क पडले. मग त्याने डॉक्टरांनी सांगितल्याप्रमाणे कॉमर्स साईडला प्रवेश घेतला. त्याने छान प्रगती केली. त्याला बारावीला ८५टक्के मार्क पडले. मग त्याने कॉमर्सची डिग्री करता करता सी.ए.ची (एन्ट्रन्स) प्रवेश परिक्षा दिली. ती तो पास झाला. नंतर सी.ए. च्या पुढील परिक्षा व बी.कॉम. चीही डिग्री परीक्षा सर्व चागल्या मार्कांनी पास झाला. त्याने सी.ए.ला ८०टक्के व बी.कॉम.ला ८२टक्के मार्क पडले. नंतर त्याने बाबांच्या ओळखीच्या एका सी.ए. च्या हाताखाली अनुभवासाठी काम करण्यास सुरुवात केली. त्याने त्यांच्या मार्गदर्शनाखाली थोडी थोडी कामंही करायला सुरुवात केली.
विश्वासराव व त्यांचा मित्र यांच्या म्हणण्यानुसार त्याने ८-१० ठिकाणी नोकरीसाठी अर्ज केले. तिथे त्याची तिथे संगणकाची व लेखी परिक्षा चांगली होत असे. पण तोंडी परिक्षेत त्याला काही नीट उत्तरं पटकन देता आल्यामुळे त्याची निवड होत नव्हती. त्यामुळे तो थोडा नाराज झाला. नोकरीचा नाद सोडून देतो असे म्हणू लागला. पण त्याचे मित्र, आई, बाबा, शिक्षक, त्यांच्या बरोबर काम करीत असलेल्या सर्वांनी व त्याला मार्गदर्शन करणाऱ्या बाबांच्या मित्रांनी त्याची समजूत काढली. नंतर त्याने एका कंपनीचा अर्ज भरला. तिथे संगणकाच्या व लेखी परिक्षेत चांगल्या तऱ्हेने पास झाला. आणि मग त्याला त्या कंपनीने इंटरव्ह्यूला बोलावल्यावर तो तिथे विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं थोडी थोडी हळूहळू दिली व काही ठिकाणी अडखळत बोलू लागला. तर त्यांना असे वाटले की तो घाबरत आहे. पण तसे नव्हते.मग तिथे एका अधिकाऱ्याला शंका आली म्हणून त्याने त्याचा बाकीचा परफॉर्मन्स पाहीला. सर्व सर्टिफिकेटस् पाहीली. तेव्हा, त्याला दहावीच्या वर्षी एक वर्ष गँप व डॉक्टरांच्या रजेच सर्टिफिकेट दिसलं. मग त्याने सर्व चौकशी केली. तेव्हा कळलं की त्याच्या बोलण्यावर ऑपरेशनचा परिणाम झाल्यामुळे तो असा बोलतो. मग त्याचा स्पेशल केस म्हणून इंटरव्ह्यूमध्ये सर्व प्रश्नांची उत्तरं लिहून द्यायला सांगितले. ती सर्व बरोबर आली. आणि त्याला ती नोकरी मिळाली. पुढे त्याने ५-६वर्षे नोकरी केली. नंतर त्याने स्वतः ची फर्म काढली. त्याला अनुरूप, छानशी सहचारिणी मिळाली. त्यांच्या सहजीवनाची बाग प्रज्ञा व अमोल या दोन फुलांनी फुलली. आणखी काय हवे! झाली पहा परिपुर्ती.