मराठी साहित्य – जीवनरंग ☆ देणाऱ्याने देत जावे…– भाग- २ ☆ श्री व्यंकटेश देवनपल्ली ☆

श्री व्यंकटेश देवनपल्ली

? जीवनरंग ❤️

☆ देणाऱ्याने देत जावे…– भाग- २ ☆ श्री व्यंकटेश देवनपल्ली

(“सगळ्यांना मदत करायला आपण काही धनाढ्य लागून गेलो नाही. जग हे या कवींच्यामुळे चालत नाही. माणूस थोडा व्यवहारीदेखील असावा लागतो.” असं बडबडत सुजाता आत गेली.)  इथून पुढे —- 

दुसऱ्या दिवशी संध्याकाळचे साडेसात वाजायला आले. जावेदचा पत्ता नव्हता. सतीशने जावेदला फोन लावला. त्याचा मोबाईल स्विच ऑफ येत होता. जावेद कुठं राहतो हेही माहीत नव्हते. 

सतीशला आता काळजी वाटायला लागली. पैसे गेल्याचे दु:ख नव्हते. देवाच्या कृपेने आजही तो काहीतरी मिळवतोच आहे. माणुसकीवरचा आपला विश्वास उडायला नको असं सतीशला मनोमन वाटत होतं. जावेदने शब्द पाळला नाही तर ‘सतीश फसवला गेला’ हा शिक्का कायमचा बसला असता, तो त्याला नको होता. यापुढे कुणा गरजू माणसाला मदत करताना आपला हात आखडता घ्यावा लागेल म्हणून सतीशला खरी धास्ती वाटत होत

सुजाता दार उघडं ठेवून शेजारच्या काकूंना सांगत होती, “कालच मी ह्याना म्हटलं होतं की तो परत फिरकणार नाही म्हणून. अख्खी दुनिया बदलली तरी आमचे हे अजून तसेच आहेत. कुणी न कुणी यांच्या हळवेपणाचा फायदा घेत असतो आणि हे फसत जातात.  ‘पुढच्यास ठेच मागचा शहाणा’ म्हणतात. भले तुम्ही लोकांच्या अनुभवातून शिकू नका. अमुक रस्त्यावरून जाताना कधीतरी ठेच लागली होती हे तरी माणसानं विसरू नये. लोकांना मदत करण्याच्या भानगडीत कशाला पडावं? ..  मागे ती कोण एक इन्वेस्टर बॅंकर आली. फारच गयावया करत होती म्हणून ह्यांनी तिला वीस हजार रूपये दिले. तिने महिन्याअखेरचा चेक दिला. महिन्याअखेरीस तिनं दहा हजार रूपये यांच्याकडे जमा करून चेक लावू नका असं सांगितलं. उरलेले दहा हजार रूपये द्यायला तिने तीन महिने लावले…..आम्ही मध्यंतरी तिरूपतीला गेलो होतो. हॉटेलातून आम्ही बाहेर पडताच एक केविलवाणं जोडपं, छोटीशी मुलगी आणि आजी यांच्यासमोर हात जोडून उभे. ‘सर आमचा खिसा कापला गेला आहे. आमच्या परतीच्या प्रवासासाठी कृपा करून पाचशे रूपयाची तरी मदत करा. तुमच्या पत्त्यावर पैसे पाठवतो.’ अशी विनवणी करीत होते. ‘आता एनीव्हेअर बॅंकिग आहे. तुमच्या नातेवाईकाकडून पैसे मागवून घ्या ‘ म्हणून सांगायचं ना? पण नाही, यांनी लगेच खिशातून शंभरच्या दोन नोटा काढून दिल्या. बाकीची व्यवस्था करून घ्या म्हणून पुढं निघाले. उलट मलाच म्हणत होते, ‘अग वेंकटेशाच्या हुंडीत दोनशे रूपये अधिक टाकले असे समज.” तिची टकळी सुरूच होती.   

सतीश खिन्न मनाने डोळे मिटून आरामखुर्चीत विसावला. थोड्याच वेळात सुजाता आली आणि शांतपणे म्हणाली, “चला, साहेब आता विसरा सगळं, जेवून घ्या पाहू.” 

सतीश जेवायला बसला खरा. त्याचं जेवणात लक्ष नव्हतं. ‘ इतक्या वर्षाच्या नोकरीत मला माणसं ओळखता आली नाहीत की काय? कितीतरी लोकांना लहानसहान कर्जे दिली. एकाही खातेदारानं कधी फसवलं नव्हतं. अमुक व्यक्ति व्यसनी आहे त्याला कर्ज देऊ नका असं गावकऱ्यांनी पूर्वसूचना दिली असताना देखील मी त्या व्यक्तिला कर्ज दिलं होतं. त्याला मी सांगितलं होतं की, ‘तुम्ही व्यसनी आहात अशी माहिती मिळाली असतानाही मी तुम्हाला हे कर्ज देतोय. गावकऱ्यांना खोटं ठरवायचं काम आता तुमच्या हातात आहे.’ त्या पठ्ठ्याने कर्जाचे हप्ते नियमितपणे फेडून माझा माणुसकीवरचा विश्वास खरा ठरवला होता.’ या विचारातच दोन घास गिळून सतीश ताटावरून उठला.  

पायात चपला सरकवून सतीश तडक एटीएम बूथवर गेला. पाच हजार रूपये खिशात कोंबून त्यानं गुपचूप घरात पाऊल टाकलं. 

“पैसे काढायला एटीएमला गेला होतात ना?” सुजाताने तोफ डागली.

सतीशला क्षणभर काय बोलावं, कळलं नाही. सतीशच्या मनात काय चाललेलं असतं हे तिला नेमकं कळतं, हा अनुभव सतीशने आजवर कित्येकदा अनुभवला होता. आता एटीएमला जाऊन पैसे काढायची गोष्ट म्हणजे हद्दच झाली होती. तो दिंग्मूढ होऊन पहात राहिला.   

“अहो, आपल्या शंभूने तुम्हाला एटीएम बूथमध्ये शिरताना पाहिलं होतं म्हणून मला म्हटलं. काय गरज होती पैसे काढायची?” सुजाता म्हणाली.     

सतीश न डगमगता म्हणाला, “हो गेलो होतो पैसे काढायला. अडीअडचणीला कामाला यावेत म्हणून घरात ठेवलेले पैसे मी जावेदला दिले होते. ते पैसे परत आणून ठेवावेत म्हणून…” गंभीर मुद्रा करून सतीश सोफ्यावर बसला. 

अचानक कौन बनेगा करोडपतीतल्या अमिताभ बच्चनच्या स्टाईलमध्ये हात वर उंचावून सुजाता उच्च स्वरात गरजत म्हणाली, ‘आप सही हो, सतीशबाबू. आप जीत गए.’ सुजातानं सतीशच्या हातात पांच हजार ठेवताच चिरंजीव शंभू टाळ्या वाजवत खळखळून हसत होते.

“अहो, तुम्ही बाहेर पडलात तितक्यात जावेद आला अन पैसे देऊन गेला. किल्ल्या अडकवण्यासाठी तुम्ही एक बोर्ड सांगितलं होतंत म्हणे, ते ही तो देऊन गेला.” 

सतीश बोर्डाचं काहीच बोलला नव्हता. जावेदनं दाखवलेलं ते कृतज्ञतेचं एक द्योतक होतं. सतीश मनोमन खूश झाला. त्याचा विश्वासावरचा विश्वास आणखी पक्का झाला. 

तितक्यात दारावरची बेल वाजली. शेजारचे प्रभाकरपंत आत आले. चौफेर नजर टाकत ते म्हणाले, “तुमच्याकडचं फर्निचर चांगलं झालं आहे असं ऐकलंय. खरंच, खूपच छान. मला त्या सुताराचा फोन नंबर द्याल काय?” 

सतीश गप्पच होता. मघाशी जावेदचा मोबाईल नंबर स्वीच्ड ऑफ आला होता. सुजाता जावेदचं नवं कार्ड त्यांच्या हातात देत म्हणाली, “ लिहून घ्या हा त्याचा नवा नंबर. आणि हो त्याला काम देताना तुमच्या जबाबदारीवर द्या बरं का, आमच्या विश्वासावर देऊ नका.”  

प्रभाकरपंत निघता निघता म्हणाले, “अहो वहिनी, विश्वास म्हणजे दोन व्यक्तीमधलं ते एक अलिखित नातं असतं. कित्येक वेळेला विश्वासाला तडा बसतो, नाही म्हणत नाही. परंतु एकमेकांवरील विश्वासाशिवाय कुणाचंच पान हलत नाही. खरं तर विश्वासावरच जग चालतं.” 

——- त्या रात्री सतीशला छान झोप लागली.

– समाप्त –

© श्री व्यंकटेश देवनपल्ली.

बेंगळुरू

मो ९५३५०२२११२

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ देणाऱ्याने देत जावे…– भाग- १ ☆ श्री व्यंकटेश देवनपल्ली ☆

श्री व्यंकटेश देवनपल्ली

? जीवनरंग ❤️

☆ देणाऱ्याने देत जावे…– भाग- १ ☆ श्री व्यंकटेश देवनपल्ली

सुजाता दारातच उभी राहून कुणाशी तरी बोलत होती, “काय काम काढलंस? त्यांनी बोलवलं होतं काय?” तिच्या या प्रश्नावर दबल्या आवाजात तो माणूस काही तरी सांगत होता. 

“ते बॅंकेतून रिटायर झाले म्हणून काय झालं, एवढे पैसे काय घरात असतात होय?” सुजाताचं बोलणं तेवढं सतीशच्या कानावर आलं. 

“ठीक आहे वहिनी, फक्त साहेबांना एकदा भेटून जातो.” असं म्हटल्यावर सुजाताने त्या गृहस्थाला आत बसायला सांगून सतीशला आवाज दिला, “अहो, ऐकलंत काय, जावेद आला आहे तुम्हाला भेटायला.”  सुजाता आत निघून गेली.   

सतीश दिवाणखान्यात येताच जावेद पटकन उठून उभा राहिला. सतीशने त्याला खुणेनंच बसायला सांगितलं आणि लगेच विचारलं, “किती पैसे हवे आहेत तुला?” 

त्यानं चमकून वर पाहिलं. सतीश हळूच म्हणाला, “मी ऐकलं आहे सगळं. किती हवे आहेत सांग.” 

इकडे तिकडे पाहत तो हळूच बोलला, “साहेब, पाच हजार रूपयाची नड आहे. मुलाला दवाखान्यात अ‍ॅडमिट करावं लागेल. तापानं फणफणला आहे तो. काल भारत बंद असल्याने माझा चेक वटला नाही. उद्या संध्याकाळी सात वाजेपर्यंत तुमचे पैसे परत करतो.” 

सतीश पटकन आत गेला. पैसे आणून त्याने जावेदच्या हातात ठेवले. जावेदही तेवढ्याच घाईत निघून गेला.

हा सगळा प्रकार सुजाताच्या लक्षात यायला वेळ लागला नाही. ती कमरेला पदर खोचत बाहेर येत म्हणाली, “काय हो, हा जावेद चार वर्षापूर्वी आपल्याकडे फर्निचरचं काम करून गेला होता ना ! त्यानंतर आजच दिसला. आजवर त्याने कितीतरी ठिकाणी कामं केली असतील. पण पैशासाठी त्याला तुमचाच भाबडा चेहरा बरा आठवला. आणि बघाच तुम्ही, उद्या तो तुमचे पैसे परत करायला फिरकणारच नाही. मी अगदी खात्रीने सांगते.” सतीशने तिचं बोलणं ऐकून न ऐकल्यासारखं केलं.

सतीशच्या फ्लॅटमध्ये जेव्हा फर्निचरचं काम करायचं होतं, तेव्हा जावेद पहिल्यांदा सतीशला भेटला होता. त्यानं एकंदर पंचेचाळीस हजाराचं एस्टिमेट सांगितलं होतं. काटेकोर मोजमापासहित आयएसआय मार्कचा कुठला प्लाय, कुठले लॅमिनेशन वापरणार हे सगळं सतीशला त्यानं समजावून सांगितलं. जावेद त्याच्या एस्टिमेटवर ठाम होता. सतीशला बजेट जास्त वाटत होतं म्हणून विचार करीत होता.  

जावेद म्हणाला, “साहेब, विश्वास ठेवा माझ्यावर, काम अगदी चोख करून देईन. दोन चार हजाराकडे पाहू नका. निकृष्ट दर्जाचे मटेरियल वापरून हेच काम तीस हजारात देखील होईल. मला क्वालिटीत तडजोड करायला आवडत नाही. या उपर तुमची मर्जी !” 

सतीश पटकन म्हणाला, “अरे त्याचं काही नाही. माझं बजेटच तीस हजाराचं आहे.” 

“साहेब उरलेले पंधरा हजार दोन चार महिन्यानंतर तुमच्या सवडीने द्या, मी अ‍ॅडजस्ट करीन.” 

फर्निचरच्या कामामुळे सतीशच्या घरातल्यांची कसलीही गैरसोय झाली नाही. जावेदने सगळी मापं काटेकोरपणाने घेतलेली होती. त्यानं सगळं वूडवर्क बाहेरच करून घेतलं. एका रविवारी येऊन फिटींग आणि लॅमिनेशन करून गेला. सतीशने देखील राहिलेले पैसे जावेदला लगेच देऊन टाकले. जावेदने काम सुरेखच केलं होतं. 

थोड्याच वेळात सुजाता सतीशच्या समोर चहाचा कप ठेवत म्हणाली, “तुम्हाला आठवतं का, मध्यंतरी तुमच्या नात्यातला कुणी तरी आठवड्यात देतो म्हणून दोन हजार रूपये घेऊन गेला, परत फिरकलाच नाही. आता कुठल्याही कार्यक्रमात दिसला तरी तो न तुम्हाला ओळख दाखवतो न मला. तुमच्या एका मित्राचा जावई ‘लगेच परत करतो’ म्हणून एक हजार रूपये घेऊन गेला. फिरकला का तो इकडे?” 

सतीश शांतपणे सुजाताला म्हणाला, “हे बघ, हे पैसे परत येणार नाहीत, हे समजून उमजूनच मी दिले होते. आपल्याकडून त्यांना केलेली ही एक नगण्य मदत आहे असं समज, हे तुला त्यावेळीच बोललो होतो. तुला ती कविता आठवतेय का? ‘देणाऱ्याने देत जावे घेणाऱ्याने घेत जावे, घेता घेता एक दिवस देणाऱ्याचे हात घ्यावे !’”

सुजाता पटकन म्हणाली, “ते कवी महाशय असं का म्हणाले मला मुळात तेच कळलेलं नाहीये. देणारा देतो आहे तर घेणाऱ्याने त्याचे हात सुद्धा कशाला घ्यावेत? त्याचे हात त्यालाच राहू द्यावेत ना !” 

सतीश हसत हसत म्हणाला, “अगं, देणाऱ्याचे हात घ्यावे म्हणजे त्या देणाऱ्या माणसाची दानत घ्यावी आणि घेणाऱ्यांनी देखील कुणाला तरी देत जावे असा त्याचा अर्थ आहे.”

“ते असू द्या, पण हा जावेद तुमचा कोण लागतो बरं?” 

या तिच्या प्रश्नावर सतीश म्हणाला, “अग, जावेद आणि माझ्यात कसलंही नातं नाही हे खरं असलं तरी किमान माणुसकीचं नातं तरी आहे ना? तूच म्हणालीस ना, त्याला तुमचाच भाबडा चेहरा का आठवला म्हणून? कदाचित जावेदने माझ्यात माणुसकीचा ओलावा पाहिला असेल म्हणून तो माझ्याकडे आलाय… 

सुजा, अग पैसे उसने मागण्यासाठी मुलगा आजारी आहे असं कारण कुणी सांगेल का? क्षणभर समज, तो खोटेही सांगत असेल. ते खोटंच आहे असं मी कशाला समजू? कदाचित खरं देखील असेल. एक वेळ बेगडी श्रीमंती दाखवता येईल पण सच्चेपणा कसा दाखवता येईल? ती सिध्दच करावी लागते. गरिबांच्यावरच विश्वास टाकता येतो याचा प्रत्यय मला खूप वेळा आलेला आहे….. एका कवीने किती छान सांगितले आहे, ‘ज्यांची बाग फुलून आली, त्यांनी दोन फुले द्यावीत. ज्यांचे सूर जुळून आले त्यांनी दोन गाणी द्यावीत. आभाळाएवढी ज्यांची उंची, त्यांनी थोडे खाली यावे. मातीत ज्यांचे जन्म मळले, त्यांना थोडे उचलून घ्यावे !’ .. कळलं?”   

“सगळ्यांना मदत करायला आपण काही धनाढ्य लागून गेलो नाही. जग हे या कवींच्यामुळे चालत नाही. माणूस थोडा व्यवहारीदेखील असावा लागतो.” असं बडबडत सुजाता आत गेली.

— क्रमशः भाग पहिला 

© श्री व्यंकटेश देवनपल्ली.

बेंगळुरू

मो ९५३५०२२११२

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ तिचं दु:ख… लेखक – अज्ञात ☆ प्रस्तुती : सुश्री माधुरी परांजपे ☆

? जीवनरंग ❤️

☆ तिचं दु:ख… लेखक – अज्ञात ☆ प्रस्तुती : सुश्री माधुरी परांजपे ☆

गीता ला जाऊन महिना झाला होता. पंधरा दिवस थांबलेली पाहुणे मंडळी आपापल्या घरी गेली होती. मुलगा अमेरिकेला जॉब करीत होता.

मुलगी म्हणाली,” चला ना बाबा सोबत काही दिवसासाठी “.

माधवने मात्र नकार दिला… रात्री त्याला भयंकर शांत वाटू लागलं…

चाळीस वर्षाच्या सहजीवनात असं कधीच एकटं राहण्याचा प्रसंग आला नव्हता. त्याला गीता सोबत घालवलेले दिवस आठवू लागले. कधी भांडण, तंटा झालेला सुद्धा आठवत नव्हतं. आपण कितीही आदळआपट केली तरी  मात्र शांतच राहायची. लोकांच्या दृष्टीने एक आदर्श जोडी. गीता  होतीच तशी. सगळयांशी मिळून मिसळून राहणारी. माधवने कधी विचारही केला नाही ती अशी आपल्याला अर्ध्यावर सोडून जाईल…

“गीता,  तुझ्याशिवाय जीवन ही कल्पनाच करता येत नाही ग… कस जगू मी गीता तुझ्या शिवाय…” माधवला हुंदका अनावर झाला…

गीताचे लग्न झाले तेव्हा ती वीस वर्षाची. लग्नानंतर प्रायमरी शिक्षिकेची नोकरी लागली. नोकरी, घर सांभाळत नेटाने संसार केला. मुलं चांगली शिकली. चांगल्या पदावर नोकरीला लागली. मुलामुलींचं लग्न झालं. आताच कुठे गीता सेवानिवृत्त झाली होती. किती ठरविले होते आपण की निवृत्त झाल्यावर दोघंही मस्त फिरू.  सगळं छान असताना अशी अचानक निघून गेली. अचानक हार्ट फेल झाले. … लक्षातच आलं नाही. अगदी शेवटच्या क्षणी लक्षात आलं. वेळच मिळाला नाही ट्रीटमेंट घ्यायला आणि  अचानक निघून गेली…

माधवने  डोळे पुसले आणि कपडे बदलायचे म्हणुन कपाट उघडलं त्याला हवा तो शर्ट दिसत नव्हता म्हणुन वरच्या कप्प्यात हात घातला.. एक डायरी खाली पडली.

थरथरत्या हातानी डायरी उघडली आणि डायरी वाचायला सुरवात केली.. 

दि, =====

‘नुकतंच लग्न होऊन महिना झालाय. घरचं वातावरण फार विचित्र आहे. सासू सासरे सतत भांडत असतात आणि भावाभावात पण विशेष पटत नाही.  नवरा तसा चांगला परंतु मी म्हणेल ती पूर्व दिशा म्हणणारा. एक दोनदा काही बोलून पाहिलं पण तो आपलं ऐकणारा नाही हे कळलं त्यामुळे तुम्ही म्हणाल तस, असं म्हणून जगायचं ठरविले… ‘

बरंच काही लिहिलं होत… तो पानं  पालटत राहिला.

दि……

आज आमच्या लग्नाचा पहिला वाढदिवस. ह्यांना म्हटलं ,”आपण बाहेर जाऊ. सिनेमाला जाऊ आणि बाहेरच जेऊ या. ” तर म्हणाले ,”मला नाही आवडत. तुला खायचं असेल तर  चल…  तू खा मी तुला सोडतो हॉटेलला “.

‘अरे, हे काय बोलणं झालं… मला काय एकटीला खायला जायची हौस होती का….?’

मैत्रिणी सांगायच्या आमच्या लग्नाच्या वाढदिवसाला आम्ही बाहेर फिरायला गेलो… नवऱ्याने गिफ्ट दिलं … फार हेवा वाटायचा… कारण इथे काहीच आवडत नव्हतं .. काही म्हटलं तर ऐकणार नाही. मला म्हणतात, ‘नवऱ्यानं गिफ्ट दिल म्हणजे, फिरवलं, हॉटेल मध्ये जेवू घातलं म्हणजे  बायकोवर खूप प्रेम करतोच असं काही नसत. नवरा -बायकोच्या प्रेमाचा जगाला दिखावा का करायचा ?’

त्यानंतर मी बाहेर चला म्हणणेच सोडले……

दि….

माझा मुलगा पाच वर्षाचा आहे . माझ्याकडे आई आलेली.. आमच्या गप्पा गोष्टी सुरु होत्या. मुलानी खाताना इकडे तिकडे सांडवलेलं. हे बाहेरून आले. कचरा पाहून डोकं फिरलं. बडबड सुरु झाली. मी म्हटलं करते ना साफ… थांबा थोडा वेळ…. माहिती नाही काय इगो दुखावला. अगदी अंगावर धावून आलेत. हात उचलला. माझ्या आईच्या डोळ्यात पाणी आले. मलाही खूप अपमानित वाटले. खुप राग आला. असं वाटल सोडून जावं परंतु तेवढी हिम्मत नव्हती आणि त्यांचा राग उतरला की परत चांगले वागतात. आपण काही चुकीचं वागलं… हीचं मन दुखावलं हे लक्षातही नसतं… मी मात्र विसरू शकत नाही.. सगळं दुःख…. मनाच्या एका कोपऱ्यात बंद करून ठेवते… आणि परत कधी ठेच लागली तर कप्पा उघडून बघते… फार त्रास होतो तेव्हा…

दि,…. 

आज मी पडद्याचे कापडं आणले…  खुप ओरडले… कुठलीही गोष्ट ह्यांच्याच मनाप्रमाणे व्हावी. मला घर सजवायला खुप आवडायचं.. काही विकत घेऊ या म्हटलं तर त्यावर लेक्चर देणार.. तुला वापरायची तरी अक्कल आहे का?   वगैरे वगैरे… काही कधी विकत आणले तर त्यात खोट काढणार. तुझी पसंत चांगली नाही… तुला व्यवहार समजत नाही.. तुला लोक ठगवतात… इतक बोलणं होतं की वाटतं कशाला आणलं आपण विकत… त्यानंतर मात्र काहीही विकत आणले नाही….

पानांमागून पान पलटवू लागला.. प्रत्येक पानावर त्याच्या तक्रारीच लिहिल्या होत्या. माधवला खूप आश्चर्य वाटले. वाटले की आपल्याला कधी वाटलेच नाही की गीता इतकी दुःखी आहे. गीताच्या मनात इतकी कटुता असून ती वरून चांगलीच वागायची. आणखी एक पान पलटवले…. बहुतेक शेवटचे.

दि….

आज डावा हात खूप दुखतोय. यांना सांगून काय उपयोग. दवाखान्यात चला म्हटलं तर बडबड करणार त्यापेक्षा नकोच. मीच जाऊन येते…. तसंही ह्यांना बाहेरगावी जायचं आहे.

दि….

काल मैत्रिणीसोबत दवाखान्यात जाऊन आली… डॉक्टरांनी सगळ्या तपासण्या केल्या.. Ecg मध्ये प्रॉब्लेम निघाला.. त्यानंतर अँजिओग्राफी सांगितली..यांना फोन लावला… म्हणाले ज्या काही तपासण्या करायच्या त्या करून घे…’

अँजिओग्राफी केली… 95 टक्के ब्लॉकेज… डॉक्टरांनी सांगितले ताबडतोब ओपन हार्ट सर्जरी करावी लागेल…

घरी येऊन यांना सांगावं या  विचारातच घरी आले…..हे बाहेरगावावरून आलेले होते. घरी येताना औषध आणायला विसरले…. खुप थकवा आला होता…

म्हटलं, ‘थोडी औषधं आणून देता का?’

‘आताच आलीस ना रस्त्याने, आणायची ना स्वतः, परत कपडे बदलवू, परत जाऊ ” खुप चिडचिड आणि बडबड केली.

“असू द्या, मी घेईन उद्या “

“अग, पण काय झालंय….? काय सांगितलं डॉक्टरांनी “

“काही नाही, सगळं ठीक आहे “

मी ह्यांना काहीही सांगितलं नाही… साधी औषध आणायला सांगितली तर किती त्रास ? आणि आपलं ऑपरेशन असलं तर किती त्रास करून घेतील.. तसंही आपण जगून काय करायचं.. मुलगा सेटल आहे… रोजची लहान सहान बाबीवरून कटकट… आता मी थकले… हार्ट प्रॉब्लेम म्हणजे मरताना त्रासही होणार नाही.. शांतपणे जाता येईल.. घेतच नाही आता औषध आणि जातच नाही आता दवाखान्यात……..

डायरीचे शेवटचेच पान होते.

माधवने डायरी बंद केली.. डोळ्यातून अश्रू वाहू लागले… गीताचा हार्ट अटॅक नसून आत्महत्या आहे आणि त्याला कारणीभूत मी आहे…. गीता, माझं वागणं तुला पटत नव्हतं तर तेव्हाच विरोध करायचास ना… तुझ्या मनात एवढा असंतोष होता हे कधी मला कळलंच नाही… मला वाटायचं आपण एकरूप आहोत परंतु नाही, तुझं शरीर फक्त माझ्या सोबत होतं आणि तुझं मन?? ते तर कधी माझं झालंच नाही…..

का वागली तू अशी गीता ? कोणत्या गुन्ह्यांची शिक्षा दिलीस तू ? गीता  मी तुला समजूच शकलो नाही… आणि तू मला समजून घेतलं नाहीस…. तू आणि मी वेगळे आहोत असा कधी विचारच केला नाही… मला वाटायचं मी माझा निर्णय तुला सांगतो आणि तो तुला पटतोय.. तुझ्यावर लादतोय असं कधी मला वाटलच नाही… तुझं मन मला कधी वाचताच आलं नाही…. पण गीता, अग एकदा बोलायचं होतंस ग.. व्यक्त व्हायच होतस… भांडलो असतो कदाचित… परंतु कदाचित मला तुझं म्हणणं पटलंही असतं… नसत पटलं तर निदान मला अपराधी पणाची भावना घेऊन तर जगावं नसतं लागलं…. मला कधीच जाणवलं नाही ग तुझी पण काही स्वप्नं असतील.

तुझं दुःख जर मला वेळीच समजलं असतं तर आज तू माझ्या सोबत राहिली असतीस ग. मला माफ कर… !!

✧═❁═✧

लेखक – अज्ञात 

संग्राहिका – सुश्री माधुरी परांजपे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ भाडेकरू… ☆ म. ना. दे. (श्री मयुरेश देशपांडे) ☆

? विविधा ?

☆ भाडेकरू… ☆ म. ना. दे. (श्री मयुरेश देशपांडे) 

“बरे झाले साठे काका तुम्ही फोन करून आलात, नाहीतर नेमके तुम्ही यायचे आणि आम्ही कुठेतरी बाहेर गेलेलो असायचो.” सुहासने साठे काकांचे अगदी हसून स्वागत गेले. त्यांना त्यांची आवडती आरामखूर्ची बसायला दिली.

“अगं मंजिरी पाणी आणतेस का? आणि हो चहा टाक साठे काकांसाठी, कमी साखरेचा बरं का.” आतल्या खोलीत कार्यालयातले काम घरी करत बसलेल्या मंजिरीला त्याने आवाज दिला.

“तसे महत्वाचेच काम होते, म्हणून फोन करून आलो होतो.” जरा स्थिरावल्यावर व पेलाभर पाणी पोटात गेल्यावर साठे काकांनी विषय काढला.

“अगं मंजिरी आधी चहा टाक, काका किती दिवसांनी आपल्या घरी आले आहेत.” साठे काका का आले असतील या विचारांत तिथेच उभ्या मंजिरीला त्याने जागे केले.

“थांब मंजिरी, मी जे सांगणार आहे ते तूही ऐकणे महत्वाचे आहे. तर बरं का सुहास, तुझ्या वडिलांनी शेवटच्या काळात माझ्याकडे एक पत्र दिले होते. ते गेल्यावर मी ते पत्र तुला वाचून दाखवावे अशी त्यांची इच्छा होती.”

काकांनी कुठल्याशा पत्राचा विषय काढताच सुहास आणि मंजिरी एकमेकांकडे प्रश्नार्थक नजरेने पाहू लागले.

“इतका विचार करायचे कारण नाही, हे काही मृत्यूपत्र नाही. त्यांना फक्त त्यांच्या मनातला विचार तुला सांगायचा होता. आधी तुझ्या नोकरीच्या धावपळीमुळे तर शेवटी दवाखान्यातल्या धावपळीमुळे त्याला तुझ्याशी नीटसे बोलता आले नव्हते. पण बहुधा त्याला त्याची वेळ जवळ आल्याचे आधीच कळाले असावे, म्हणून त्याने हे पत्र खूप आधी लिहून ठेवले होते. फक्त माझ्या हातात शेवटच्या काळात दिले.” आता साठे काकांनी दीर्घश्वास घेतला. त्यांच्या डोळ्यांच्या कडा पाणावल्या होत्या. त्यांनी आणखी घोटभर पाणी घेतले.

“काका असे काय आहे त्या पत्रात की जे त्यांना माझ्या जवळ किंवा मंजिरीच्या जवळ बोलता नाही आले.” सुहासच्या मनात नाना शंकांचे काहूर माजले होते. मंजिरी शांत असली तरी तिचीही अवस्था फार वेगळी नव्हती. एवढ्या वेळ उभ्या मंजिरीने पटकन भिंतीला टेकत खाली बसणे पसंत केले.

काकांनी सोबतच्या पिशवीमधून पत्र बाहेर काढले. कार्यालय सुटले तरी कार्यालयातील कामकाजाची पद्धत सुटली नव्हती. आणि म्हणूनच पत्र अगदी खाकी लिफाफ्यामध्ये वरती छान अक्षरात अगदी नाव तारीख घालून ठेवले होते. काकांनी आधी पत्र सुहासला दाखवले. वडिलांचे अक्षर त्याने सहज ओळखले. ते सुबक नक्षीदार असले तरी शेवटच्या काळात थरथरत्या हातांनी नक्षी थोडी बिघडली होती.

काकांनी पत्र वाचायला सुरूवात केली. वरचा मायना वाचला तसे सर्वांचेच डोळे पाणावले. अधिक वेळ न दवडता त्यांनी पुढचे वाचायला घेतले.

“मला कल्पना आहे की, या वाड्याची वास्तू पाडून ही जागा एखाद्या व्यावसायिक इमारत विकासकाला द्यायची तुझी इच्छा अनेक वर्षांपासून आहे. तू माझ्याकडे थेट विषय काढला नसलास तरी कधी ताई तर कधी मंजिरीच्या आडून तो माझ्या पर्यंत पोहचवत राहिलास. माझ्या पाठीमागे या वाड्यावर तुझा व बहिणीचा समसमान हक्क आहे हे मी वेगळे सांगायला नको.”

“पण काका मला यातले काहीच नको आहे. माझे घर केव्हाच झाले आहे. तुम्हा सर्वांच्या आशीर्वादाने गाठीला बक्कळ पैसाही आहे. ताईने हवे तेव्हा या वाड्याचा ताबा घ्यावा, मी हसत माझ्या घराकडे निघून जाईन.”, काकांचे पत्र वाचन मधेच तोडत सुहास तावातावाने बोलला. तसा त्याचा हात दाबत मंजिरीने त्याला शांत केले.

“अरे मला पत्र तर पूर्ण वाचू देत.”, असे म्हणत काकांनी पुढे पत्र वाचायला सुरूवात केली.

“माझ्या आजोबांपासूनचा म्हणजेच तुझ्या पणजोबांपासूनचा हा वाडा. इथे काही बिऱ्हाडे पिढ्यान् पिढ्या राहात आहेत. जशी तुझी माझी नाळ जुळली आहे तशीच या बिऱ्हाडांच्या पुढच्या पिढ्यांशी माझी नाळ जुळली आहे. तू जागा विकसकाला देताना ताईचा विचार घेशीलच याची खात्री आहे पण सोबत या बिऱ्हाडांचाही एकदा विचार घ्यावा एवढीच माझी विनंती आहे, त्यांची योग्य व्यवस्था करावी एवढीच माझी शेवटची इच्छा आहे.”

पुढची पत्राच्या समारोपाची वाक्ये वाचायची गरजच नव्हती. त्यांची पत्र लिहिण्याची पद्धत, त्यातली भाषा, सुरूवात व समारोप आताशी साऱ्यांच्या परिचयाचे झाले होते. काकांनी पत्र सुहासच्या हाती सुपूर्त केले. पुढची काही मिनिटे तो नुसताच पत्रावरून हात फिरवत होता. “मी आत जाऊन चहा टाकते.”, त्यांची तंद्री तोडत मंजिरी म्हणाली आणि झपझप आत गेलीही.

बाहेर फक्त साठे काका, सुहास आणि वडिलांचे पत्र राहिले होते.

वाडा तसा खरेच जुना होता. अनेक बिऱ्हाडे आधीच सोडून गेली होती. काही खोल्या वारसा हक्क राहावा म्हणून कुलुपे आणि जळमटांसह बंद होत्या. न मागता दर महिना खात्याला भाडे म्हणून नाममात्र रक्कम जमा होत होती. पण सुहासच्या चटकन लक्षात आले की ज्यांच्यासाठी वडिलांचा जीव अडला होता किंवा त्यांनी एवढा पत्र प्रपंच केला होता, ते जोशी मास्तर वाड्याच्या मागच्या अंगणातील खोल्यांमध्ये आपल्या पत्नीसह राहात होते. पंख फुटले तशी मुले केव्हाच उडून गेली होती. पाठीमागे दोन जीर्ण देहांसह जीर्ण घरटे राहिले होते.

त्यांची जुजबी व्यवस्था करून सुहासला हात काढता आले असते, किंबहुना विकसकाने तसे सुचविले देखील होते. ना जोशी मास्तरांमध्ये लढायची ताकद होती ना त्यांच्या बाजूने कोणी लढायला उभे राहिले असते. काही शिक्षक दुर्लक्षिले जातात हेच खरे.

विकसकाला जागा ताब्यात द्यायला अद्याप पुष्कळ वेळ होता. सुहासने जोशी मास्तरांच्या मुलांशी संपर्क करून पाहिला. अपेक्षेप्रमाणे समोरून काहीच प्रतिसाद आला नाही.आता मात्र एक वेगळीच कल्पना सुहासच्या मनात आली आणि ती त्याने आधी मंजिरीला मग ताईला बोलून दाखविली. साठे काकांना यातले काहीच सांगायचे नाही असे त्याने दोघींना बजावले होते. जोशी मास्तरांशी तो व मंजिरी स्वतः जाऊन बोलले. त्याची कल्पना ऐकून तर मास्तर ढसाढसा रडले.

इकडे साठे काका लांबूनच पण वाड्यात घडणाऱ्या घडामोडींवर लक्ष ठेवून होते. सुहास सामानाची बांधाबांध करीत असल्याचे त्यांच्या लक्षात आले. पण त्याने जोशी मास्तरांचे काय केले याचा काही थांग पत्ता लागत नव्हता. त्याला वडिलांच्या पत्राची आठवण करून द्यावी असे काकांना खूपदा वाटले, पण त्यांनी धीर धरला. एके दिवशी वाड्याच्या दारात ट्रक उभा असल्याचे त्यांना कोणाकडून तरी कळाले आणि हातातली सगळी कामे टाकून त्यांनी वाडा गाठला.

“अरे सुहास तू निघालास वाटतं. ते जोशी मास्तर कुठे दिसत नाहीत, त्यांचे काय ठरवले आहेस? तुझ्या वडिलांचे पत्र लक्षात आहे ना?” काहीसे रागात काहीसे नाराजीने पण एका दमात साठे काका बोलून गेले.

“ते तर पुढे गेले.”, ओठांवर हसू आलेले असतानाही कसेबसे ते दाबत सुहास थोडा कर्मठपणे बोलला.

“पुढे गेले म्हणजे? कुठे गेले?” साठे काकांचा पारा चढला.

“माझ्या घरी, माझे स्वागत करायला.” सुहासने अगदी संयमाने प्रतिउत्तर दिले.

“तुझ्या घरी म्हणजे? तू मला नीट सांगणार आहेस का? हे बघं तुझ्या वडिलांची अंतिम इच्छा होती की …” साठे काकांचे वाक्य पूर्ण होऊ न देताच सुहासने त्यांना वाड्याच्या पायऱ्यांवर बसवले.

“काका मी त्यांना दत्तक घेतले आहे. लोक मूल दत्तक घेतात तसे मी आई वडील दत्तक घेतले आहेत आणि आता अगदी शेवटपर्यंत मी त्यांचा संभाळ करणार आहे.” एखाद्या मुलाने वडिलांच्या खांद्यावर डोके ठेवावे तसे सुहासने साठे काकांच्या खांद्यावर डोके ठेवले आणि म्हणाला, “तसेही आई बाबांच्या पाठीमागे आम्हाला तरी आधार कोण आहे.” साठे काकांच्या डोळ्यांतून अश्रूधारा वाहात होत्या आणि आज त्या पुसायचे भानही त्यांना राहिले नव्हते.

लेखक : म. ना. दे.

(श्री होरापंडीत मयुरेश देशपांडे)

C\O श्री मंदार पुरी, पहिला मजला, दत्तप्रेरणा बिल्डिंग, शिंदे नगर जुनी सांगवी, पुणे ४११०२७

+९१ ८९७५३ १२०५९ 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

 

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ रेशमाची झूल… ☆ सुश्री स्वप्ना मुळे (मायी) ☆

सुश्री स्वप्ना मुळे (मायी)

? जीवनरंग ?

☆ रेशमाची झूल… ☆ सुश्री स्वप्ना मुळे (मायी)

“गेले पंधरा दिवस भुर्रकन निघून गेले … उद्या तुम्ही पण जाल.. मग मात्र सासुबाईंशिवाय हे घर मला आणि अविला खायला उठेल हो ताई..” एवढं बोलून शरु ढसढसून रडायला लागली. ह्या पंधरा दिवसात ती बरीच खंबीर होती. खरंतर आईचं पडल्यापासूनचं दुखणं या आठ महिन्यात तिनेच काढलं होतं. आपण फक्त नावाला लेक होतो. तिच्या कर्तव्याने खरी लेक शरुच झाली होती. त्यामुळे आपल्याला आईची उणीव जाणवणार, पण शरुला ती जास्त प्रखरपणे जाणवेल..

… स्मिताने तिला पटकन जवळ घेतलं. थोडा वेळ कोणीच काही बोललं नाही, कारण ‘ स्वामी तिन्ही जगाचा आईविना भिकारी ‘ हे आता सगळेच अनुभवत होते. तिघांनी परत मनसोक्त रडून घेतलं. 

मग शरु अलगद उठली. कपाटातून तिने सासुबाईचे कानातले जोड आणि बांगड्या नणंदेपुढे ठेवल्या. कपाटही उघडं ठेवलं. ती स्मिताला म्हणाली, ” ताई, आईची आठवण म्हणून हे दागिने आणि त्यांच्या ज्या साड्या पाहिजे त्या तुम्ही घेऊन जा…”

स्मिता उदास हसत म्हणाली, “अगं माणूस आठवणींनी मनात, हृदयाच्या कप्प्यात जपलेला असतो.. ह्या वस्तू, दागिने हे सगळं गौण आहे गं,.. मला काही नको, असू  दे तुमच्याकडेच.. आईचा एवढा दवाखाना, खर्च, तुम्ही सगळं कसं पेललं असेल ह्याची कल्पना आहे मला… हे दागिने सगळे तुमच्याकडेच ठेवा. पण एक वस्तू मात्र मी हक्काने मागेल. आईने रेशीम दोऱ्याची एक सुंदर झूल शिवली होती.. ती मला दे. त्याच्या फार सुंदर आठवणी आहेत गं माझ्या मनात.”

शरुने लगेच खालच्या पांढऱ्या शुभ्र कपड्यात गुंडाळलेली ती झूल काढली. स्मिताने ती गच्च छातीशी धरली. तिला परत आईची खूप आठवण आली. रडणं ओसरल्यावर ती बोलू  लागली, ” एकदा मागच्या अंगणात एक गाभण गाय हंबरत होती.. आईने बघितलं आणि म्हणाली ‘अगं बाई, इथेच पाडस जन्माला घालते की काय..? हिचा मालक कुठे गेला, का ही वाट चुकुन इकडे शिरली..’ .. पण तिला आता हाकलून लावणं शक्य नव्हतं… अवि तुला आठवतं का, त्या गावी बाबांची बदली झाली होती तिथं आपलं मागच्या पुढच्या अंगणाचं घर होतं बघ.”

त्यावर अवि म्हणाला, ” फार काही आठवत नाही, पण त्या कच्च्या दुधाच्या वड्या आठवतात.. पोटभर खायला मिळाल्या होत्या बघ….”

स्मिता म्हणाली, ” हं, तू लहान होतास फार, मला मात्र स्पष्ट आठवतं सगळं.. आपल्याकडे कामाला येणाऱ्या शामलाबाईंना आईने लगेच बोलवलं.. त्यांना सगळी माहिती होती.. आई म्हणाली ‘ मुकं जनावर असलं तरी त्रास आणि लाज दोन्ही असतात प्राण्याला..’ 

भिंतीच्या कोपऱ्यात घुसून हंबरत होती ती गाय. मग आईने तिला आडोसा केला.. गरम पाण्याचा शेक… अगदी जणू लेकीचं बाळंतपण केल्यासारखं केलं.. पाडस तर किती सुंदर होतं.. आणि काही क्षणात चार पायावर उभं राहिलं. आई म्हणाली, ‘ देवाला काळजी सगळ्या जीवांची.. ह्या मुक्या प्राण्यांना बघा कसं मिनिटात उभं करतो तो.. आपली लेकरं वर्ष घेतात..’ 

शामलाबाई आईला म्हणायच्या, ‘ फार जीव लावू नका, कधी मालक येईल आणि घेऊन जाईल तर करमणार नाही…’ आईने तेंव्हा त्या पाडसासाठी ही झूल केली होती.. अगदी रातोरात जागून… म्हणाली, ‘आपल्याकडे नव्या लेकराला कपडे करतात, त्याला झूल तर करू….’

मला फार आवडली होती ती रेशमी झूल, सुंदर रंगांची मऊमऊ. मी पण जागी होते त्या रात्री.. सकाळी उठून कधी त्या पाडसावर घालू असं झालं होतं.. पण सकाळी जाग आली ती आईच्या रडण्याने… गाय, वासरू निघून गेलं होतं आपल्या वाटेने.. तू खूप रडला होतास.. ‘बांधलं का नाहीस?’ तिला विचारत होतास…

आई म्हणाली, ‘ ती आपली मालकीची नव्हती, तिची अडचण म्हणून आडोश्याला उभी राहिली. आपलं मन वेडं, लगेच गुंतलं त्यात.’

मी ही झूल छातीशी घट्ट धरून रडत होते. आई म्हणाली, ‘ रडू नकोस.. अगदी स्त्री जन्म कसा असतो ते तुझ्या या वयात ही गाय येऊन तुला शिकवून गेली बघ. लज्जा, वेदना, मातृत्व… बघितलं ना वासराला कशी चाटत होती, आनंदाने दूध पाजत होती सगळ्या वेदना विसरून.. परत आपण दिलेल्या आरामाच्या मोहात रमली नाही, गेली निघून. आपल्या कर्तव्यांचं असंच असतं..  स्त्रीच जगणं…  माहेरी दोन दिवस यायचं, लाड करून घ्यायचे आणि जायचं निघून परत आपल्या भूमिकेच्या युद्धावर..’

आईने झूल हातात घेतली.  म्हणाली, ‘आता येणाऱ्या प्रत्येक चैत्र गौरीला मी ही झूल घालेल.. त्यावर माझी गौर बसेल.. कारण ही गाय माझ्या लेकीसारखीच आली माझ्या आयुष्यात, राहिली आणि निघून गेली… पण ह्या रेशमी झुलीवर तिच्या आठवणींच्या पाऊलखुणा सोडून गेली…’ आईने ह्या झुलीतून मला खूप काही शिकवलं आयुष्यभरासाठी. ही तिची आठवण मात्र मला द्या..”

अविने आणि शरुने स्मिताला जवळ घेतलं. तिघेही आईच्या आठवणीने रडत होते आणि रेशमी झूल, म्हणजे आईनेच हातात हात धरलाय असं अनुभवत होते…

© सुश्री स्वप्ना मुळे (मायी)

मो +91 93252 63233

औरंगाबाद

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ तीन अनुवादित लघुकथा ☆ सौ. उज्ज्वला केळकर ☆

सौ. उज्ज्वला केळकर

? जीवनरंग ?

☆ तीन अनुवादित लघुकथा ☆ सौ. उज्ज्वला केळकर 

(1) निगेटिव रिपोर्टची कमाल – अज्ञात (2) कर्जमुक्त – श्री अशोक दर्द (3) कोरोनाची भाकरी – श्री घनश्याम अग्रवाल 

☆ निगेटिव रिपोर्टची कमाल – अज्ञात ☆ भावानुवाद – सौ. उज्ज्वला केळकर ☆ 

दहा दिवसांच्या प्रयत्नांनंतर एक माणूस आपला करोंनाचा निगेटिव्ह रिपोर्ट हातात घेऊन हॉस्पिटलच्या रिसेप्शनजावळ उभा होता.

आसपासचे काही लोक टाळ्या वाजावत होते. त्याचं अभनंदन करत होते. युद्ध जिंकून आला होता ना तो. त्याच्या चेहर्‍यावर मात्र बेचैनीची गडद छाया होती. गाडीतून घरी येताना त्याला रस्ताभर ‘आयसोलेशन’ च्या त्या काळातली असह्य मन:स्थितीची आठवण येत होती.

कमीतकमी सुविधा असलेली ती छोटीशी खोली, काहीशी अंधारी, मनोरंजनाचं कुठलंच साधन नाही. कुणी बोलत नव्हतं की जवळही येत नव्हतं. जेवण देखील प्लेटमध्ये भरून सरकवून दिलं जायचं.

ते दहा दिवस त्याने कसे घालवले, त्याचं तोच जाणे. 

घरी पोचताच त्याला दिसलं, त्याची पत्नी आणि मुले दारात त्याच्या स्वागतासाठी उभी आहेत. पण त्यांच्याकडे दुर्लक्ष करत तो घराच्या एका उपेक्षित कोपर्‍याकडे वळला. तिथल्या खोलीत त्याची आई गेली पाच वर्षे पडून होती. आईचे पाय धरून तो खूप रडला आणि आईला धरून घेऊन बाहेर आला.

वडलांच्या मृत्यूनंतर गेली पाच वर्षे ती आयासोलेशन ( एकांतवास ) भोगत होती. तो आईला म्हणाला, ‘ आई, आजपासून आपण सगळे एकत्र, एका जागी राहू.’

आईला आश्चर्य वाटलं. पत्नीसमोर असं सांगण्याची हिंमत आपल्या मुलाने कशी केली? इतकं मोठं हृदयपरिवर्तन एकाएकी कसं झालं? मुलाने आपल्या एकांतवासाची सारी परिस्थिती आईला सांगितली आणि म्हणाला, आता मला जाणीव झाली, एकांतवास किती दु:खदायी असतो.

मुलाचा निगेटिव्ह रिपोर्ट आईच्या जीवनाचा पॉझिटिव्ह रिपोर्ट बनला होता. 

मूळ कथा – निगेटिव रिपोर्ट की कमाल –  मूळ लेखक – अनाम लेखक

☆ ☆ ☆ ☆ ☆

☆ कर्जमुक्त – श्री अशोक दर्द  ☆ भावानुवाद – सौ. उज्ज्वला केळकर ☆ 

एक काळ असा होता, शेठ करोडीमल आपल्या मोठ्या व्यवसायामुळे आपला मुलगा अनूप याच्यासाठी वेळ देऊ शकत नव्हते. मुलाला चांगलं शिक्षण मिळावं आणि आपल्या व्यवसायातही व्यवधान निर्माण होऊ नये, म्हणून त्यांनी आपल्या मुलाला दुरच्या शहरातील बोर्डिंग स्कूलमध्ये ठेवलं. वर्षभराने सुट्टी लागली की ते नोकराला पाठवून मुलाला घरी आणत. सुट्टी संपली की त्याला पुन्हा त्याच शाळेत पाठवलं जायचं.

काळ बदलला. आता अनूप शिकून मोठा व्यावसायिक बनला. शेठ करोडीमल म्हातारे झाले. वडलांचं अनूपवर मोठं कर्ज होतं. त्याने चांगल्या शाळेत घालून त्याला शिकवलं होतं.

वडलांचा कारभार आता मुलाने आपल्या हातात घेतला. त्यात खूप वाढ केली. कारभारात अतिशय व्यस्तता असल्यामुळे अनूपला आता आपल्या म्हातार्‍या बापाकडे लक्ष द्यायला फुरसत नसे. त्यामुळे त्याने आता वडलांना शहरातील चांगल्या वृद्धाश्रमात ठेवलं. वेळ झाला की त्यांना घरी नेण्याचं आश्वासन दिलं आणि तो पुन्हा आपल्या व्यवसायात रमून गेला. वृद्धाश्रमातला मोठा खर्च करून, त्याला आपण कर्जमुक्त झालो, असं वाटू लागलं होतं.

मूळ कथा – कर्जमुक्त – मूळ लेखक – श्री अशोक दर्द  मो. – मो. 9418248262

☆ ☆ ☆ ☆ ☆

☆ कोरोनाची भाकरी – श्री घनश्याम अग्रवाल  ☆ भावानुवाद – सौ. उज्ज्वला केळकर ☆ 

करोंनाचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला. घरात शांतता पसरली. म्हातार्‍याला आयसोलेशन्समध्ये ठेवलं गेलं. सून दोन वेळचा चहा आणी जेवणाची थाळी घाबरत घाबरत खोलीच्या उंबरठ्यावर ठेवायची. मग हात सॅनिटायझराने स्वच्छ धुवायची.

म्हातार्‍याने आज तीनपैकी दोनच भाकरी खाल्ल्या. उरलेल्या तिसर्‍या भाकरीचं काय करणार? वाटलं, बाहेर जाऊन एखाद्या भिकार्‍याला किंवा गायीला घालावी. पण खोलीपुढे १४ दिवासांची लक्ष्मणरेषा ओढलेली होती. अखेर त्याने भकारी उंबर्‍यावर ठेवत सुनेला म्हंटलं, ‘भाकरी फुकट जायला नको. बाहेर कुणाला तरी देऊन टाक.’

‘हा म्हातारा म्हणजे नं…. कुणाला देणार त्याचा हात लागलेली भाकरी?….’ अखेर तिने चिमट्यात धरून ती भाकरी उचलली आणि पेपरमध्ये गुंडाळून बाहेरच्या गेटपाशी गेली कचराकुंडीत भाकरी टाकायला. पण कचराकुंडी दूर होती. अचानक तिला म्हातारा भिकारी हात पसरत येत असलेला दिसला. द्यावी त्याला? पण तोही माणूसच ना! तिने त्याला जवळ बोलावले. कागदात गुंडाळलेली भाकरी त्याला देत ती म्हणाली, ‘ ही कचराकुंडीत टाक. करोना पॉझिटिव्हवाल्याचा हात याला लागलाय याला आणि हे घे पाच रुपये तुला.’

करोंनाची इतकी भीती  आणि चर्चा होती की भिकारीदेखील त्याबद्दल काही बाही  ऐकत होते. दोन दिवसांचा भुकेजलेला असूनही त्याने विचार केला, करोंनावाल्याचा हात लागलेली ही भाकरी… नाही… नाही…मी ही खाणार नाही. ही कचराकुंडीत टाकून पाच रूपायांची भाकरी विकत घेऊन खाईन मी. भाकरी विकत घेण्याच्या विचाराने त्याच्या चालीत एकदम रुबाब आला. पहिल्यांदाच तो भाकरी विकत घेऊन खाणार होता.

कचरापेटीपर्यंत येता येता त्याच्या मनात विचार आला, त्याला भाकरी विकत कुठे मिळणार? सगळी हॉटेल्स, खानावळी बंद आहेत. त्याचे हात भाकरी टाकता टाकता थबकले.

मग त्याने भाकरी नीट निरखून बघितली. त्याला कुठे काही व्हायरस दिसला नाही. मग त्याने ती दोनदा झटकली. असला व्हायरस तर पडून जाईल. मग त्याने भाकरीकडे पाहिले. करोना पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह दोघेही भाकरी खातात. भाकरी पॉझिटिव्ह – निगेटिव्ह कशी असेल? भाकरी भाकरीच असते. शिवाय कुणा भिकार्‍याला कोरोना झालेला ऐकला नाही. कुणा भिकार्‍याला क्वारंटाईन झालेलं पाहीलं नाही. भुकेने सगळे सोयिस्कर तर्क केले. त्याने पुना भाकरी झटकली नि मनाशी म्हणाला, ‘ समाजा एखादा व्हायरस पोटात गेलाच, तर काय होईल? या रोटीमुळे इतकी इम्युनिटी मिळेलच, की ती त्या व्हायरसला मारून टाकेल. आता तो इतका प्रसन्न होऊन भाकरी खाऊ लागला की जसा काही तो कोरडी भाकरी खात नाही आहे, तर भाजीबरोबर भाकरी खात आहे.

मूळ कथा – कोरोना की रोटी  –  मूळ लेखक – श्री घनश्याम अग्रवाल मो. 94228 60199

☆ ☆ ☆ ☆ ☆

अनुवाद – सौ. उज्ज्वला केळकर

संपर्क – 176/2 ‘गायत्री’, प्लॉट नं 12, वसंत साखर कामगार भवन जवळ, सांगली 416416 मो.-  9403310170 ईमेल  – [email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ पांढरा प्रकाश/white light… ☆ सुश्री विभावरी कुलकर्णी ☆

सुश्री विभावरी कुलकर्णी

 🌸 विविधा 🌸

☆ पांढरा प्रकाश/white light… ☆ सुश्री विभावरी कुलकर्णी ☆

विश्वातील असा स्रोत आहे ज्यामध्ये सकारात्मक ऊर्जा असते. सहाय्य, उपचार आणि नकारात्मक ऊर्जा किंवा अस्पष्ट कंपनांपासून संरक्षणासाठी पांढर्‍या प्रकाशाला कोणीही (बरे करणारे, सहानुभूती देणारे कोणीही!) आवाहन करू शकतात. महत्त्वाचे म्हणजे पांढर्‍या प्रकाशाचा वापर कोणालाही किंवा कशालाही इजा करण्यासाठी केला जाऊ शकत नाही. तसेच त्याने कोणत्याही प्रकारे नुकसान होऊ शकत नाही.

 व्हाईट लाइट बोलावणे पांढऱ्या प्रकाशासाठी ओरडणे किंवा गुडघे टेकून प्रार्थना करण्याची विनंती करण्यासारखे नाही. आपण धार्मिक असणे आवश्यक नाही, फक्त तो प्राप्त करण्यासाठी खुले असावे. प्रकाश सर्वांसाठी उपलब्ध आहे… जर तुम्ही त्याच्या उपचार आणि कंपनांना स्वीकारत असाल तर तो अधिक सहज उपलब्ध आहे.

शुद्धीकरण आणि परिवर्तनासाठी नकारात्मक किंवा  गलिच्छ  ऊर्जा पांढर्‍या प्रकाशाकडे पाठविली जाऊ शकते किंवा निर्देशित केली जाऊ शकते. उदाहरणार्थ तुम्ही विनंती करू शकता की तुम्ही तुमच्या मधून बाहेर काढलेल्या अशुद्धता शुद्धीकरणासाठी पांढर्‍या प्रकाशाकडे पाठवत आहे.

पांढर्‍या प्रकाशाच्या परिवर्तनाची संकल्पना अगदी सोपी आहे.जसे तुमचे सर्व घाणेरडे कपडे पॅक करण्याचा आणि ड्राय क्लीनला टाकण्याचा विचार करा. तुमचे कपडे जसे एका बॅग मध्ये भरून लॉंड्रीत देता आणि  काही दिवसांनी  ते स्वच्छ  होऊन परत येतात तसेच हे आहे.

पांढर्‍या प्रकाशाच्या क्षेत्रात जे काही प्रवेश करते किंवा ज्यावर पांढरा प्रकाश पडतो ते स्वच्छ आणि शुद्ध होऊन बाहेर येते.

पांढरा प्रकाश देवदूत,चांगल्या शक्ती घेऊन येतात.

विश्वास ठेवा की जेव्हा तुम्हाला पांढर्‍या प्रकाशाच्या संरक्षणाची इच्छा असेल तेव्हा तो तुम्हाला मिळेल. जसे की रिक्षा ला कॉल करणे. तुम्हाला फक्त दरवाजा उघडण्याची आणि प्रकाशाचे स्वागत करण्याची आवश्यकता आहे.

आपल्याला जीवनात मिळालेले धडे,वाईट अनुभव,नकळत केलेली चुकीची कर्म इत्यादी सर्व गोंधळातून बाहेर पडण्याचे ठिकाण आहे.तसेच अत्यंत विश्रांतीची जागा आहे.

पांढर्‍या प्रकाशाचे व्हिज्युअलायझेशन व्यक्तिपरत्वे भिन्न असू शकते. काहींना पांढर्‍या रंगात लहान धूमकेतूसारखे चमकणारे चमक दिसू शकतात, तर इतरांना चमकणारे मोठे पांढरे गोळे दिसू शकतात.काहींना पांढरे सोनेरी किरण दिसतात.काहींना प्रकाशाचा शॉवर दिसतो.काहींना उजेड दिसत नाही पण जाणवतो.काहीतरी आपल्या कडे येत आहे असे वाटते.अशा कोणत्याही स्वरूपात ही अनुभूती येते.

दिवसातून 10 मिनिटांनी सुरुवात करा, हळूहळू कालावधी 30 मिनिटांपर्यंत वाढवा.

श्वेत प्रकाश/white light ध्यान काय आहे आणि त्याचे फायदे काय आहेत?

तुम्हाला अनेक फायदे मिळू शकतात. त्यापैकी काही येथे आहेत:

🪷 तुमची प्रेरणा सुधारते आणि वाढवते .

🪷 दृढनिश्चय आणि सहनशक्ती सामर्थ्य देते.

🪷 तुम्हाला तुमच्या ध्येयांवर अधिक चांगले लक्ष केंद्रित करण्यात मदत होते.

🪷 तुम्हाला तुमचे ध्येय साध्य करण्यात मदत करते .

🪷 आत्मविश्वास सुधारतो.

🪷 यशाच्या मार्गात येणाऱ्या अडथळ्यांवर मात करण्यास मदत करते.

🪷 स्पष्ट विचार प्रक्रिया करण्यास मदत करते.

🪷 अडकलेला गाभा स्वच्छ आणि साफ करतो आणि अशा प्रकारे तुम्हाला आजारापासून दूर ठेवतो.

पांढऱ्या प्रकाशाच्या ध्यानाचा सराव करण्यासाठी तुम्हाला दिवसातून फक्त 10 मिनिटे लागतात. जेव्हा तुम्ही मनाच्या निवांत अवस्थेत याचा सराव करता तेव्हा परिणाम चांगले मिळतात, तुम्ही जागे होताच हे करणे सुरू करण्याचा सल्ला दिला जातो.

सर्वोत्कृष्ट परिणाम मिळविण्यासाठी तुम्ही काही गोष्टी तुमच्या मनात ठेवल्याचे सुनिश्चित करा.

🪷 धीर धरा.

🪷 प्रामाणिक रहा.

🪷 परिणामांची अपेक्षा ठेवून कधीही ध्यान करू नका.

🪷 नकारात्मक विचार नेहमी तुमच्या फोकसपासून दूर ठेवा.

🪷 नेहमी सकारात्मक उर्जेने वावरत रहा.

🪷 पूर्णपणे दयाळूपणे ध्यान करा.

श्वेत प्रकाश ध्यान हे शुद्धीकरण आणि आत्मज्ञान प्राप्त करण्याचा एक उत्तम मार्ग आहे. हे तुमचे शरीर आणि मन पुन्हा टवटवीत करण्यास मदत करते. आणि राग, चिंता आणि तणाव यासारख्या नकारात्मक भावनांवर नियंत्रण ठेवण्यास मदत करते . यात प्रत्येक अवयवांना व मन त्यातील विचारांना स्थिर,शुद्ध करणे हे होत असते. त्यामुळे आपल्यातील प्रेरणा आणि सहनशक्ती वाढते, चांगले विचार करण्याचे प्रमाण वाढते, उद्दिष्टांकडे लक्ष  केंद्रित करणे जमू लागते, दृष्टीकोन बदलतो, आत्मविश्वास वाढतो,आपण स्पष्ट आणि तर्कशुद्ध विचार करू लागतो. आणि शरीर शुद्ध होते. हे या ध्यान तंत्राचे काही प्रमुख फायदे आहेत. हे ध्यान दिवसातून किमान 10 मिनिटे आरामशीर मनःस्थितीसह स्वतःमध्ये हळूहळू परिवर्तन करण्यासाठी करा.

पांढरा प्रकाश ध्यान तुमची नैसर्गिक उपचार क्षमता वाढवते असे मानले जाते.

हे तुम्हाला तुमच्या ध्येयांवर लक्ष केंद्रित करण्यात मदत करते आणि तुमचा आत्मविश्वास आणि प्रेरणा सुधारते.

हे मन स्वच्छ करते आणि तुम्हाला तुमच्या भावनांवर नियंत्रण ठेवण्यास मदत करते.

सर्वोत्तम परिणाम मिळविण्यासाठी दयाळू, प्रामाणिक आणि संयमाने ध्यान करा.

© सुश्री विभावरी कुलकर्णी

सांगवी, पुणे

मोबाईल नंबर – ८०८७८१०१९७

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ ‘जे.बी.एल.’… ☆ सुश्री शांभवी मंगेश जोशी ☆

सुश्री शांभवी मंगेश जोशी

?जीवनरंग ?

‘जे.बी.एल.’… ☆ सुश्री शांभवी मंगेश जोशी

आला! काळा वड्डा! नाही नाही काळदेव! काळुराम! असं म्हणत, इश्मत, मुश्ताक आणि जेनीनं एकमेकांना टाळ्या दिल्या. त्यांच्या अचकट विचकट हसण्यानं जबीलच्या मस्तकात तीव्र सणक गेली. तेवढ्याच जोरात हातातला दगड जबीलने त्यांच्याकडे भिरकावला. इश्मतच्या डोळ्याला रक्ताची धार लागली.

प्रिन्सिपल मार्थासमोर जबील, भीतीनं, तेवढाच संतापानं आणि वेदनेनं, थरथर कापत उभा होता. आता जबरदस्त शिक्षा होणार हे त्याला कळून चुकलं होतं.

‘‘इसके पेरंट्सको बुलालो, इमिजिएट!’’ असं म्हणत, त्या जबीलच्या जवळ पोहोचल्या. एरवी प्रेमळ म्हणून प्रसिद्ध असलेल्या मार्था मॅडमचा जेवढा संताप, धाक अन् दरारा होता; तेवढाच जबीलच्या डोळ्यात त्वेष आणि संताप होता. हाताच्या मुठी घट्ट आवळून, त्या मागे बांधून जबील उभा होता.

लहानपणापासून काळा-काळा म्हणून चिडवणारी, हिणवणारी अनेक दृष्यं, त्याच्या डोळ्यासमोरून सरकत होती.

‘‘हात आगे!’’

मोठ्ठी छडी, त्याच्या डोळ्यासमोर नाचवत मार्था मॅडम ओरडल्या.

ओठ घट्ट आवळून, जबील टपोरे डोळे ताणून, त्यांच्याकडे बघत राहिला.

‘‘हात आगे! सुनाई नही देता?’’

तरीही जबील तसाच!

संतापाने बेभान झालेल्या मार्था मॅडमने त्याच्या खांद्यावर सटकन् छडी मारली.

त्याबरोबर जबीलच्या उजव्या हाताची मूठ पुढे आली अन् त्याच्या चारही बोटांनी मार्था मॅडमच्या हातावर काळ्याकुट्ट, तेलकट, वंगणासारख्या पदार्थाचा फटकारा मारला. मार्था मॅडमच्या गोर्‍या धप्प हातावर जबीलचे इवल्याश्या चार बोटांचे काळे कुट्ट फटकारे उठून दिसत होते. त्या जागी मॅडमना प्रचंड झोंबू लागलं. ‘‘स्स्… हां…!’’ करून त्या चित्कारल्या. हातातली छडी गळून पडली. त्या हाताकडे बघत राहिल्या. अनपेक्षित प्रकाराने सारेच गोंधळले. मॅडमच्या भोवती जमा झाले. संधीचा फायदा घेऊन जबीलने धूम ठोकली. शाळेच्या गेटवरून उडी मारून, तो पसार झाला.

मार्था मॅडम निवृत्त होऊन बरीच वर्ष झाली, तरी त्यांच्या हातावरची खूण मिटली नव्हती. त्यासाठी त्यांनी अनेक औषधोपचारही केले. पण ती जन्माचीच खूण त्यांच्या हातावर उमटली.

मार्था मॅडमच्या हातात एक पत्र होतं.

‘‘मॅडम, मी तुमचा विद्यार्थी आहे. माझ्या संशोधनासाठी मिळालेला पुरस्कार तुम्हाला प्रदान करण्याची इच्छा आहे…’’ असं म्हणून कार्यक्रमाला उपस्थित रहाण्याची विनंती केली होती.

खाली सही – J. B. L. अशी अक्षरं होती. जस्ट बी लव्हिंग – असा त्याचा विस्तार आणि अर्थही होता. कितीही डोक्याला ताण दिला तरी मॅडमना काही आठवेना. पण विद्यार्थ्यांच्या कौतुकासाठी कार्यक्रमाला जाण्याचं त्यांनी निश्चित केलं. कार्यक्रमाच्या वेळेपूर्वी मॅडमसाठी कार पाठवली होती. मॅडम व्यासपीठावर येताच, एका व्यक्तीनं त्यांच्या पायावर डोकं ठेवलं. मॅडमने त्याच्या खांद्याला धरून उठवलं.

‘‘मॅडम माफ केलंत का मला? मी जबील. ओळखलतं का मला?’’

मॅडमने आश्चर्यानं ‘आ’ केला. त्याचवेळेस त्यांचा उजवा हात डाव्या हातावरच्या खुणेवरून फिरत राहिला. J. B. L. अक्षराचा अर्थही उलगडला.

‘‘मॅडम, माणसांच्या कातडीचा काळा रंग बदलण्यासाठी मी औषध शोधून काढलं आहे. त्यासाठी मला हा पुरस्कार मिळत आहे. त्या दिवशी तुम्ही मारलेल्या छडीमुळेच मी हा शोध लावू शकलो. हा पुरस्कार मी तुम्हाला प्रदान करत आहे.’’ असं म्हणून जबीलनं मॅडमच्या हातात पुरस्कार ठेवला. त्यावरची जे. बी. एल. अक्षरं उठून दिसत होती.

‘‘जस्ट बी लव्हिंग’’ असं म्हणत जबीलनं डबीतलं औषध, मार्था मॅडमच्या हातावर प्रेमानं, हळुवार हातानं लावलं. म्हणाला, ‘‘मॅडम रोज हे औषध लावलं तर महिनाभरात हे व्रण नाहिसे होतील. एवढंच नाही, कोणताही काळा माणूस त्यामुळं गोरापान होईल. पण एकदा माफ केलं म्हणा.’’

मॅडमच्या पाण्यानं भरलेल्या डोळ्यापुढं, छोटा जबील दिसत होता. इतक्याश्या हातानं फटका मारणारा. समोर उभं राहून जबील विचारत होता, ‘‘माफ केलंत का मॅडम? सांगा ना.’’

© सौ. शांभवी मंगेश जोशी

संपर्क – सुमन फेज 4, धर्माधिकारी मळा, एस्सार पेट्रोल पंपामागे, सावेडी, अहमदनगर 414003

फोन नं. 9673268040, [email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ मोगराच तो शेवटी… लेखक – अनामिक ☆ प्रस्तुती – श्री मेघ:शाम सोनावणे☆

श्री मेघ:श्याम सोनावणे

? जीवनरंग ?

☆ मोगराच तो शेवटी… लेखक – अनामिक ☆ प्रस्तुती – श्री मेघ:शाम सोनावणे ☆

“काय गं …!!! कालच तुला खडसावून सांगितले, की बंगल्याच्या भिंतीला पण स्पर्श करायचा नाही… तरी तू आज परत आलीस फुलं मागण्यासाठी…???”

ती कळकट मळकट फ्रॉक घातलेली ८-९ वर्षांची मुलगी अत्यंत  केविलवाणा चेहरा करून करुणेच्या स्वरात आवाजात कापरं भरत बोलली  “….. ताय वंजळभरच पायजेती, द्या की व. तुमच्या झाडाला हायती बी फुलं म्हणून मागत्या. इथं कुठंच येवढी फूलं नायत, फकस्त तुमच्याच बंगल्यात हायत.” …. ती आठ नऊ वर्षांची मुलगी काकुळतीला येऊन अनघाला तिच्या बंगल्यातील मोगऱ्याची फुले मागत होती.

“नाही म्हणून सांगितले ना. निघ इथून…” असं म्हणून अनघा बंगल्यात गेली. ‘कुठून कुठून येतात फुलं मागायला. काय फुकट येतात का.’ असं एकटीच बडबडत होती

तेवढ्यात तिचा नवरा राघव आला. “काय झालं, कोणाला बडबडतेस ? इथे तर कोणीच दिसत नाही ?”

“अहो गेले आठ दिवस झाले, एक मुलगी मोगऱ्याची फुलं मागायला येतेय. देवाला पाहिजेत म्हणे. एवढीच हौस आहे तर घ्यायची ना विकत.”

राघव – “अनघा !!! अगं ती फुलं तर मागतेय. द्यायचीस ना. तसंही मोगरा किती लगडलाय फुलांनी.”

अनघा अभिमानाने म्हणाली – “हो, फुलं खूप लागली आहेत, पण त्याच्या मागे माझे किती कष्ट आहेत. अख्ख्या गल्लीत कुणाच्याच बंगल्यात झाडाला एवढी फुलं नाहीत, फक्त माझ्या दारात. आणि खूप निगा राखावी लागते झाडांची, फुकट नाहीत येत. खत, वेळेत कटिंग, पाणी, आणि तुम्हाला माहिती आहे ना मी रोज पूजा करताना देवाला भरपूर फुलं वाहते. सगळ्या देवांच्या फोटोंना ताजे हार घातल्याशिवाय पूजा केल्याचं समाधान नाही मिळत मला.”

राघव – “अगं एक फूल वाहिलं तरी देवाला पुरेसं असतं. दिलीस चार फुलं त्या मुलीला तर जाणार आहेत देवाच्याच पायाशी. तू वाहिली काय अन् त्या छोट्या मुलीने. देव तर एकच आहे.”

अनघा – “ओ तुमचं लॉजिक तुमच्या जवळ ठेवा. माझे कष्ट आहेत त्यामागे.”

“अनघा – एक सांगू !!!! असं दारातून रिकाम्या हाताने पाठवू नये कुणाला आणि काय फुलं तर मागतेय ना .. तिने कुठे तुला जेवण किंवा पैसे मागितले. आपल्याकडे आहे त्यातलं थोडं द्यायला मनही तेवढं मोठं असावं लागतं. अनघा !!!! तुला समजवायचं काम केलंय, ऐकायचं का नाही ते तूच ठरव.”

अनघा – “बरं !!! उद्या आली मागायला तर देईन चार फुलं, तेही तुम्ही सांगता म्हणून..”

राघव – “बरं.  पण जरा प्रेमाने दे. रागे नको भरू त्या छोट्या मुलीला.”

अनघा – “हं !”

दुसऱ्या दिवशी सकाळी सकाळी दारात ती मुलगी उभीच. राग आलेला, पण राघवसाठी देते. ” ये मुली, थांब तिथंच, देते फुलं.” छोट्या पिशवीत पंधरा वीस फुलं तोडून टाकली. तिच्याजवळ जात म्हटलं ..

” उद्यापासून यायचं नाही फुलं मागायला !!!!!”

ती मुलगी — अडखळत अडखळत–  ” ताय, ते आठ दिस फुलं पायजेती. देशीला का ? “

अनघा – “आठ दिवस रोज !! कशाला ??”

” ते कोपऱ्यावर महादेवाचं देऊळ हाय बघा, तिथं द्याला मायला पायजे व्हती.” तिची नजर खाली पायाकडं, चेहऱ्यावर निर्विकार भाव. ती बोलली. आवाज खूप लाघवी, हळू. ” माय देवाला बोलली हाय ‘आठ दिस ताजी फुलं पायाशी घालीन’.”

अनघा – (मनात )- ‘म्हणजे नवस’. तिला जोरात ओरडत…  ” देवाला अर्पण करायला मागून फुलं… घे जा ना विकत, देवळाच्या बाहेर मिळतात पाच दहा रुपयांत.”

मुलीचा चेहरा खाडकन उतरला, “ताय ….ते… पैसं रोज…… एवढं..”

अनघा – ” कळलं !! नाहीयेत ना पैसे. बोलताच कशाला गं मग असं देवाला. आपल्या कुवतीनुसार बोलावं.”

ती काहीच न बोलता फुलांची पिशवी घेऊन खाली मान घालून निघून गेली.

अनघाला मात्र आपण जरा जास्तच बोललो ह्याची सल मनाला लागली. उद्या येईल का ? नाही येणार बहुतेक. किती बोललो, ते ही फुलांसाठी. आज ताजी असणारी फुलं नाही तोडली तर उद्या सुकून कोमेजून तर जाणार आहेत. तिनं खिडकीतून बाहेर पाहिलं, मोगराही थोडा नाराजच दिसला. ‘जावू दे, उद्याचं उद्या पाहू’ असं म्हणत ती कामाला लागली.

दुसऱ्या दिवशी सकाळी दारात ही बया उभीच. अनघाला मनात हुश्श वाटलं, ‘आली बाई आज परत….’

“ताय…….” तिने हाक मारली.

अनघा – “हो आले, देते फुलं. कुठं राहतेस गं ?”

ती – “गावाच्या बाहेर पडकी साळा हाय, तिथ.”

अनघा- “घरात कोण कोण आहे ??

ती – ” माय, बा, मोठी बहण, दोन भाव. आज्जी बी हाय पण ती लाम गावी असत्या.”

अनघा – “बरं बरं. घे फुलं आणि निघ.”

ती – “जी ताय.”

आठ दिवस न चुकता ती मुलगी फुलं न्यायला येत होती. आपण खूप मोठं काम करतोय, दानधर्म वगैरे… अनघाच्या चेहऱ्यावर किंचितशी अभिमानाची लकेर उमटली. स्वतःशी हसत अनघा म्हणत होती – 

‘रोज फुकट फुलं दिली, देवही नकळत आपल्यावर खूष असणारच. मी फुलं दिली म्हणून तिच्या आईचा नवस पूर्ण झालाय, नाहीतर तिला विकत फुलं घेणं शक्यच नव्हतं ‘ —

एकटीच बोलत होती इतक्यात राघव तिथे आला. “काय एकट्याच गालात हसताय .”

अनघा – ” काही नाही रे राघव, ती मुलगी फुलं न्यायला आठ दिवस न चुकता येतं होती, पण आता ह्या दहा बारा दिवसात कुठे आलीच नाही.”

राघव – “अगं आता कशाला येईल, तिला आठच दिवस फुलं हवी होती ना ! तसंही तुला तिचं फुलं मागणं आवडतं नव्हतं.”

अनघा – “अरे पण एकदा परत येवून आभार तरी मानायचे तिने माझे. लोकं केलेले उपकार असे विसरतात, म्हणून कुणाला काही देवू नये. तू सांगितलेलं ना म्हणून न चिडचिड करता फुलं दिली आठ दिवस. रोज ….”

राघव हसला. 

अनघा – “काय झालं ??”

राघव – “काही नाही.”

तेवढ्यात बाहेरून हाक आली–  “….ताय व ताय….!”

हा तर त्या मुलीचा आवाज. दोघंही बाहेर आली तर दारात ती मुलगी उभी.

अनघा – ” काय आज पण फुलं पाहिजेत का ? आधीच सांगते, नाही देणार. आज फुलं थोडी कमीच लागली आहेत. मला देवपूजेला पाहिजेत.”

ती – “…फुलं नको ताय ……ते…. हे….. हे….”  हातात मळकट फडकं होतं, आणि  त्यात काहीतरी गुंडाळलेले.

अनघा – “काय…. .ते….. हे……”

ती – ” ताय !!!! ते मोठी बहण बाळतपणाला आल्या. ‘ यवस्थित  बाळ हु दे ‘ म्हणून माय नवस बोलल्याली माहदेवाला. तुम्ही फुलं दिली, आयचा नवस पुरा झाला. परवा दिशी मुलगा झाला बहयणीला. यवस्थित हाय सगळं. माझा बा दगड फोडतो आणि मुरत्या बनीवतो. ताय, बा नं हे बनीवलं हाय तुमच्यासाठी. ‘तुमचं उपकार जन्मभर नाय इसरणार’ –बा बोललाय आसं… अन् माय म्हणली ‘ कुणाचबी काय फुकट घेव नी. आपल्या परीनं परत द्याव.’ म्हणून हे…. घ्या……”

अनघाने ते मळकट फडकं हातात घेतलं. उघडून पाहिलं. अतिशय सुरेख, सुंदर, रेखीव अशी, दगडापासून घडवलेली विठ्ठल रखुमाईची मूर्ती. किती तेजस्वी, आनंदी, सात्विक आहेत दोन्हीही मूर्ती. अनघा आनंदून गेली.

अनघा – त्या मुलीला म्हणाली,  “अगं ऐक !!!”

पण ती मुलगी नव्हती तिथं. पटकन मूर्ती देवून निघूनही गेली. अनघाचे आभाराचे दोन शब्द ऐकायलाही नाही थांबली ती. 

अनघाचे डोळे पाण्याने डबडबले आपण किती खुजे, संकुचित… एका क्षणात खूप लहान ठरलो हिच्यापुढे. सारा गर्व, अभिमान एका झटक्यात गळून पडला…… एखाद्याची कुवत ठरवणारे आपण कोण, का हिने न बोलता आपल्याला आपली कुवत दाखवली……  

मोगऱ्याचा सुगंध साऱ्या अंगणात दरवळला. आज तो रोजच्यापेक्षा जास्त टवटवीत बहरलेला वाटला……

आपण पण अहंकाराला गंगेत अर्पण करावं … मग बघा संसाराचा मोगरा पण कसा बहरतो ते….. !!!

लेखक – अनामिक

प्रस्तुती : मेघ:शाम सोनावणे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ बायकोतली आई… ☆ सुश्री स्वप्ना मुळे (मायी) ☆

सुश्री स्वप्ना मुळे (मायी)

? जीवनरंग ?

☆ बायकोतली आई… ☆ सुश्री स्वप्ना मुळे (मायी)

“गप्प बैस गं, काय कटकट लावली आहेस सकाळपासून, इथे आधीच टेन्शन कमी आहे का..? तुला जी भाजी वाटते ती कर, मी काही म्हणणार नाही…” तो खेकसला तिच्यावर.

तशी आवंढा गिळून बळचं हसु चेहऱ्यावर आणत ती स्वयंपाक घरात आली. “चालेल त्यांना भोपळ्याची भाजी,” असं कापऱ्या आवाजात म्हणाली…

सासुबाईला बाहेरचा त्याचा कडाडणारा आवाज ऐकू आलाच होता, त्याचा चहा घेऊन त्याच बाहेर गेल्या. त्याच्याजवळ बसत म्हणाल्या, “सध्याच्या परिस्थितीमुळे आर्थिक ताण आहेत ह्याची तिलाही जाणीव आहे, म्हणून तर गेल्या दोन महिन्यात तुला रुपया न मागता स्वतःच्या भिशीचे पैसे ती घरात वापरतीये. पैठणी भिशीतून तरी घेऊ म्हणत अगदी रंग देखील ठरवला होता तिने, पण तुझ्यावरचं आर्थिक संकट बघुन माघार घेतली, तो पैसा घरात वापरला. तिची छोटीशी सन्मानाची नोकरी ह्या कोरोनाने गेली, नाहितर हातभार लावतच होती ना ती संसाराला, आणि अगदी रस्त्यावर, उघड्यावर येण्यासारखी परिस्थिती नाही झालीय आपली.. हा, सगळे शानशोक बंद झाले, पण ते तसे अन्न, वस्त्र, निवारा ह्या तीन गरजांव्यतिरिक्त होते, मग आहे त्यात समाधान मानायचं सोडून चिडचिड करून जगण्यातली मजा का घालवतोस रे?’ म्हणत आई जरा रागावली त्याला…

तितक्यात त्याचा फोन वाजला, कामावरच्या राजूचा होता. तो उठून बाल्कनीत गेला. मिस कॉलच होता तो, आता त्याला कॉलबॅक करणं आवश्यक होतं. कारण बांधकामाच्या साईटवरचा तो अगदी खास माणूस होता, पण गेल्या दोन महिन्यापूर्वी एका साईटवर काम करताना हॅण्डग्रँडर हातातुन निसटून पूर्ण गुढघ्याला वळसा घालून गेलं होतं, रक्ताची कारंजी उडाली होती आणि राजू त्या दिवसापासून कामावर नव्हता.….

राजूच्या बायकोने फतवाच काढला होता, लंगडत, धडपडत कामावर जायचं नाही, तर पूर्ण बरं वाटेल तेंव्हाच जायचं. त्यामुळे ह्या दोन महिन्यांत भेट नव्हती त्याची. खरंतर फार गरज होती त्याची कामावर. खूप विश्वासू होता तो.

‘बहुतेक हा कामावर येईल आता म्हणूनच फोन असेल…’ असा विचार करत त्याला कॉलबॅक केला,.. “हॅलो बोल राजू,.. येतोस कामावर आज??”

तिकडून आवाज आला.. “सर, कामावर दोन दिवसात येईन पण आज मला थोडे पैसे पाहिजे होते, उद्या मदर्स डे आहे. पोरगा त्याच्या आईसाठी भेटकार्ड बनवत होता तेंव्हा मला कळलं. मला आईला साडी घ्यायची आहे. थोडे पैसे देता का,..?

त्याचं वाक्य पुर्ण होण्याच्या आत हा हसायला लागला.. “अरे राजा, तूझं डोकं आहे ना ठिकाण्यावर, अरे तुझी आई दोन वर्षांपूर्वी वारली ना, मग कोणाला गिफ्ट देतोस तू,..?”

राजू तिकडून म्हणाला, “हसू नका साहेब, ह्या दोन महिन्यात माझी बायको माझी आई झाली होती. लहान लेकरासारखं तिनं माझं सगळं केलं. अगदी खाऊ सुद्धा घातलं, तिनं पाच पाच घरं जास्त भांडी घासायची कामं घेतली. माझ्या कमाईची तिनं भरपाई केली, मला कुठलाही ताण घेऊ दिला नाही.

आता मी पूर्ण बरा झालोय सर.. आपल्या त्या साईटच काम मीच पूर्ण करीन.  पण मला थोडे पैसे द्या.. बायकोला सेमी पैठणी घेऊन देतो.. पैठणी नाही पण सेमिपैठणी तरी घालायची आहे तिला, आणि खूप फोटो काढायचं स्वप्न आहे तिचं….

माझ्या मित्राचं साड्यांचं घरगुती दुकान आहे, तो म्हणाला, ‘तू ये, देतो तुला..’ मला तीन हजार द्या सध्या,.. आपलं काम पन्नासच ठरलेलं आहे ना, मी नक्की करीन ते पूर्ण, आणि आईला नाही कधी साडी घेऊ शकलो पण आता ह्या बाईत गावलेल्या आईला तरी घेऊ द्या.. साईटवर येऊ का पैसे घ्यायला..?”

गडबडत हा म्हणाला, “हो, तासाभरात ये..” म्हणत याने फोन ठेवला आणि सहज बाल्कनीत नजर फिरवली.. छोट्या छोट्या कुंड्यात, वाफ्यात बराच भाजीपाला लावलेला होता.. वेलाला दोडकी, कारली लटकत होती.. कडीपत्ता हवेवर डोलत होता.. आपण एक दिवस ओरडलो होतो.. ‘किती खर्च करता त्या भाजीपाल्यावर,..?’ त्याचं हे उत्तर होतं, त्याकडे आपलं लक्ष पण नाही.

राजूसारखा माणुस त्याच्या बायकोची किती किंमत करतो आणि आपण हिला किती गृहीत धरतो.. आई म्हणते तसं इतकीही आपली परिस्थिती बिकट नाही, फक्त मन बाहेरच्या परिस्थितीने गडबडलं आहे.. आपण उगाच ह्या घरच्यांना धारेवर धरतोय..

तो विचार करत होता तेवढ्यात आईने हाक मारली, “डबा तयार आहे रे….”

निघताना तो हळूच आईला म्हणाला, “हिने भिशी कोणत्या रंगाच्या पैठणीसाठी लावली होती गं, आणि तुझ्याकडे होती ना एक पैठणी.”

आई म्हणाली, “अरे मला मेलीला आता ह्या कॉटन शिवाय काही सहनही होत नाही… म्हणून तुझ्या ताईने पळवली ती तुझ्या लग्नाआधीच, नाहीतर हिला दिलीच असती की मी. आणि माझी जांभळी होती रे, तिला हिरवीगार पैठणी घ्यायची आहे. आता कधी योग येतो की बिचारीला,….?”

साईटवर राजू वाटच बघत होता.. ह्याने त्याला पैसे दिले आणि म्हणाला, “राजा मलाही घेऊन चल ना त्या दुकानात.. मलाही बघू दे साडी, आईला आणि बायकोला घेतो.”

सेमीपैठणीतून राजाने लाल रंग निवडला. ह्याने पण हिरवा रंग घेतला व आईला कॉटनची साडी घेतली.. दुकानाबाहेर पडताना त्याने पाणावलेल्या डोळ्यांनी राजाचे आभार मानले.. “आई तर आहेच माझी, पण बायकोतली आई शोधून दिलीस तू,..”

दुसऱ्या दिवशी दोघींना सोफ्यावर बसवल्ं, औक्षण करून त्यांच्या डोक्यावर फुलं टाकत म्हणाला.. “हॅप्पी मदर्स डे, मला माहित आहे आई तुला ही पाश्चिमात्य पद्धत आवडत नाही. मनात प्रेम तर असतंच, पण मला वाटतं प्रेम व्यक्त करायला ठरवला एखादा दिवस तर काय हरकत आहे ना, आणि तो ही आईसाठी आहे.. सेलिब्रेशन घरात तर करतोय..” म्हणत त्याने साड्या दोघींसमोर धरल्या… तिला खूपच आवडला तो हिरवागार रंग.. आईचे तर डोळेच पाणावले, “अरे मला कशाला आणत बसलास ॰..?”

त्याने आईला जवळ घेतलं, “आई सुनेसाठी मला समजवणारी ग्रेट आई आहेस तू.. तुला तर पाहिजेच, आणि राणीसरकारची भिशी सगळा घराचा खर्च पेलतीय तर त्यासमोर ही तर छोटीशी भेट आहे.. पण पुढच्या वेळी अगदी ओरिजनल पैठणी घेईन मी तिला.. आणि तेही मदर्स डे ला.. कारण बघ ना, ती बायको असली तरी.. मला मुलासारखं समजून तर पटकन सावरून धरलंय तिने. आपले अहंकार बाजूला सारून जी बाई नवऱ्यावर प्रेम करू शकते ना आई, ती त्याच्या बायकोतली आई असते…”

आईने त्याच्या डोक्यावर हात फिरवला…. “अरे प्रत्येक स्त्री मध्येच हे आईपण असतं रे….”

तितक्यात राजूने व्हिडीओ कॉल केला “साहेब तुमचे आभार, आमची आई एकदम खूश आहे बघा..” ती कष्टाने रापलेली त्याची बायको त्या साडीत आनंदी दिसत होती, आईने तिचं फोनवर कौतुक केलं.. नवऱ्याने आपला समाजात वाढवलेला सन्मान बघून ती आणखीनच खुलली.

फोन ठेवला तर समोर.. ही पैठणी नेसुन आली. त्याला ती आताही आपल्या आईसारखी दिसली, अगदी शांत, समाधानी, आनंदी.. गॅलरीत बहरलेल्या हिरव्यागार बागेसारखी..!

 © सुश्री स्वप्ना मुळे (मायी)

मो +91 93252 63233

औरंगाबाद

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares
image_print