मराठी साहित्य – जीवनरंग ☆ पाणी… भाग – १ ☆ श्री दीपक तांबोळी ☆

श्री दीपक तांबोळी

 

? जीवनरंग ?

☆ पाणी… भाग – १ ☆ श्री दीपक तांबोळी

तिकीट काढून देवबा मुर्तिजापूरच्या स्टेशनमध्ये घामाघूम होत शिरला तेव्हा दुपारचे तीन वाजून गेले होते. मे महिन्याची ती दुपार. हवेत भयंकर उष्मा होता. अंगाची लाहीलाही होत होती. प्लॅटफाॅर्मवरच्या बाकावर त्याने नातवांना बसवलं. गर्मीमुळे त्यांचेही चेहरे सुकून गेले होते. भुसावळकडे जाणारी पॅसेंजर लेट झाली होती आणि तिला यायला अजून अर्धा तास अवकाश होता. थोडं पाणी प्यावं म्हणून त्याने पिशवीतली बाटली काढली तर ती रिकामी. ती ठेवून त्याने दुसरी बाटली काढली तर तीही रिकामीच. चमकून त्याने दहा वर्षाच्या नातीकडे पाहिलं तशी ती म्हणाली

” दादूने पिऊन टाकलं सगळं पाणी “

त्याने रागाने नातवाकडे पाहून विचारलं

“व्हय रं बेटा? “

नातवाने निरागसपणे मान डोलावली. त्याच्या चेहऱ्यावर केविलवाणे भाव उमटले. आजोबा आता मारतो की काय अशी भिती दाटून आली. देवबा त्याच्या चेहऱ्यावरचे भाव पाहून वरमला. त्याचा स्वतःचाच जीव तहानेने कासावीस होत होता. ही तर लहान मुलं होती. बसमध्ये देवबाचा डोळा लागलेला असतांना दोघा मुलांनी पाण्याचा थेंब न थेंब संपवून टाकला होता. त्यांच्यावर रागावून काहीच फायदा नव्हता. देवबाने रिकाम्या बाटल्या घेतल्या आणि तो प्लॅटफाॅर्मवर पाण्याचा शोध घेऊ लागला. पण एकाही नळाला थेंबभरही पाणी नव्हतं. त्याने समोरच्या प्लॅटफाॅर्मवर नजर टाकली. तिथल्या नळांनाही पाणी दिसत नव्हतं. स्टेशनमास्तरच्या ऑफिससमोर उभ्या असलेल्या रेल्वे कर्मचाऱ्याला त्याने विचारलं

” बाबूजी पाणी हाये का कुठं? लेकरासाठी पाहिजे हुतं “

कर्मचाऱ्याने त्याला वरपासून खाली बघितलं आणि म्हणाला

” बाबा मागल्या वर्षी पाणी पडलं होतं का? “

देवबाने नकारार्थी मान हलवली

” मंग कसं राहिन पाणी? आम्हांलेबी इथे प्यायले पाणी नाही. तुले कुठून दिवू? आमीबी बाहेरुन मागवतो. जाय त्या कॅन्टीनमधी लागो तितकं पाणी हाये” कँटीनकडे हात दाखवत तो म्हणाला. देवबा मोठ्या आशेने तिकडे गेला.

” बाबू पाणी हाये का? “

कॅन्टीनमधल्या माणसाने पटकन फ्रिजमधून पाण्याची बाटली काढून त्याच्यासमोर ठेवली

“बीस रुपया”

” बीस रुपये? नाय. मले लेकरांसाठी थोडंसंच पाणी… “

त्या माणसाने ताबडतोब बाटली उचलून फ्रिजमध्ये ठेवली.

“खुल्ला नही है पानी बाबा. बाहर जाओ, हाॅटलमें मिल जायेगा”

जिन्याने देवबा बाहेर आला. रोडावरच्या हाॅटेलमध्ये त्याने बाटली दाखवत पाणी मागितलं

” बाबा चाय पिना है तो पिलो. पानी नही मिलेगा. बोतल दे दू? बीस रुपयेकी है ” हाॅटेलमालकाने विचारलं.

देवबाने नकारार्थी मान हलवली आणि तो दुसऱ्या हाॅटेलवर गेला. तिथून तिसऱ्या. चहाच्या टपऱ्याही त्याने सोडल्या नाहीत. पण कुणीच त्याला पाणी दिलं नाही. बाटली विकत घ्यावी का असा प्रश्न त्याला पडला. पण त्यासाठी वीस रुपये खर्च करणं त्याच्या जीवावर येत होतं. देवबा म्हणजे शेतकरी माणूस. दोन एकरच्या कोरडवाहू शेतीचा मालक. शेजारच्या शेतातल्या विहिरीचं पाणी विकत घेऊन तो आपली शेती करायचा. मागच्या वर्षी पावसाने डोळे वटारले, धरणातलं, नद्यानाल्यातलं, जमीनीतलं पाणी सुकलं तशी ती विहिरही कोरडी पडली. निवडणुका आल्या की पाणीपुरवठ्याच्या योजनांच्या घोषणांचा पाऊस पडायचा पण मंत्रालयात जाहीर झालेला निधी सरपंचापर्यंत येतायेताच संपून जायचा. उन्हाळा आला की टॅंकर लाॅबी सक्रिय व्हायची. त्यात सत्ताधाऱ्यांसह विरोधी पक्षनेतेही आपले खिसे भरगच्च भरुन घ्यायचे. गावं मात्र तहानलेलीच रहायची. कुणालाही निवडून द्या आपल्या नशिबात पाण्यासाठी मरमरच आहे हे सत्य गावाने आता स्विकारलं होतं. अर्थात देवबालाही हे माहीत झालं होतं. पाण्याचा तुटवडा झाला की तो दुसऱ्याच्या शेतावर जाऊन मजुरी करायचा. त्यातून त्याच्या पदरी दोन मुली, मुलगा नव्हता. कष्टाची आणि काटकसरीची देवबाला आणि त्याच्या बायकोला कायमची सवय जडली होती. मुलींच्या लग्नाचं त्याच्याही डोक्यावर कर्ज होतंच. पण मुली सासरी सुखाने नांदताहेत हीच त्याच्यासाठी समाधानाची बाब होती. शाळांना सुट्या लागल्या तसं भुसावळला रहाणाऱ्या धाकट्या मुलीने आपल्या मुलांना देवबाकडे सोडलं होतं. मुलांना गावात करमेनासं झालं म्हणून देवबा त्यांना भुसावळला सोडायला चालला होता. खरं तर देवबालाही त्यांनी रहावं असं वाटत नव्हतं. पाण्याचा प्रश्न बिकट झालेला. दहादहा दिवस पाण्याचा टँकर गावात यायचा नाही. आला की त्यावर मरणाची गर्दी व्हायची. दोन चार हंडे मिळाले की टँकर संपून जायचा. तेच मिळालेलं पाणी जपून वापरावं लागायचं. त्यातून नातवंडं दिवसभर पाणी मागत रहायची. मग देवबा सायकलवरुन

आठ किलोमिटरवरच्या ओळखीच्या शेतकऱ्याकडून विकत पाणी आणायचा. पण आता त्याचं वय झालं होतं. तेवढ्या श्रमाने तो प्रचंड थकून जायचा.

तो रिकाम्या बाटल्या घेऊन स्टेशनवर परतला. तहानेने त्याचाही जीव कासावीस झाला होता. नातवांजवळ तो आला तसं नातीने त्याला विचारलं

“आबा पाणी नाय मिळालं? दादू परत पाणीपाणी करतोय. मलेबी तहान लागलीये”

दोन्ही नातवांचा रडवेला चेहरा पाहून पाणी कुठून तरी आणावंच लागेल या विचाराने देवबा उठला. तेवढ्यात त्याची नजर थोड्याच अंतरावर बसलेल्या कुटुंबाकडे गेली. साताठ जणांच्या घोळक्यात एक मोठा वीस लिटरचा जार त्याला दिसला. पण त्या लोकांच्या कपड्यावरुन ते मोठ्या घरातील लोक आहेत हे देवबाला समजत होतं. कुठल्यातरी एक्स्प्रेस गाडीची ते वाट बघत असावेत. त्यांना पाणी मागणं देवबाला उचित वाटेना. ते नाहीच म्हणणार हे नक्की होतं. सध्या कोण कुणाला पाणी देतंय त्यातून देवबा असा फाटका शेतकरी माणूस. समोर उभं तरी करतील की नाही देव जाणे.

“आबा पाणी पाहिजे” नातवाने त्याच्या हाताला स्पर्श करुन सांगितलं. त्याने नातवाकडे पाहिलं तर तोही त्या जारकडे बोट दाखवत होता. आता हिंमत दाखवावीच लागणार होती. त्याने एक बाटली पिशवीत टाकली आणि एक बाटली घेऊन तो तिकडे गेला. ती माणसं काहीतरी इंग्रजीयुक्त मराठीत बोलत होती. देवबाला तिथून पळून जावंसं वाटू लागलं. तो घुटमळला आणि परत नातवांकडे जायला निघाला. पण पाणी तर नेणं आवश्यकच होतं. काय करावं त्याला सुचेना

“काय बाबा काय पाहिजे? “कुणीतरी विचारलं

” दादा जरा पाणी पाहिजे हुतं. लेकरं लय तहानलीयेत” 

तो एका माणसाला म्हणाला. तसे सगळेजण एकमेकांकडे बघायला लागले. त्यांचंही बरोबरच होतं. अशा भयंकर उष्म्यात आपलं पाणी दुसऱ्याला देणं म्हणजे स्वतःवर नामुष्की ओढवून घेण्यासारखंच होतं.

” अरे तिथे कँटीनमध्ये लागो तितक्या पाण्याच्या बाटल्या मिळतात. तिथून घ्या ना ” एक बाई चिडून म्हणाली

” बाबा हे पाणी आमचं स्पेशल पाणी आहे. उकळून थंड केलेलं. ते आम्हांलाच पुरणार नाही. तुम्हांला कसं देणार? “

एक माणूस म्हणाला तसा अवघडून देवबा परत जाण्यासाठी वळला.

” थांबा बाबा” 

देवबाने पाहिलं मध्यभागी बसलेला एक शेठजीसारखा माणूस त्याच्याकडेच बघत होता. देवबा थांबला तसा तो इतरांकडे बघत तो म्हणाला

“अरे पाणी विकत घेण्यासारखी बाबांची परीस्थिती असती तर ते आपल्याकडे पाणी मागायला आले असते का? आणि तहानलेल्याला पाणी पाजण्याइतकं पुण्य दुसरं नाही. बाबा किती जण आहात तुम्ही? “

” तीन जण “तीन बोटं दाखवत देवबा म्हणाला. त्या माणसाने खिशातून शंभरची नोट काढून एका तरुण मुलाला दिली आणि म्हणाला

“जा. बाबांना त्या कँटीनमधून तीन पाण्याच्या बाटल्या घेऊन दे”

देवबाच्या आनंदाला पारावार उरला नाही. आंधळा मागतो एक देव देतो दोन अशी त्याची मनःस्थिती झाली. तो त्या तरुण मुलासोबत कँटीनकडे गेला. मुलाने थंड पाण्याच्या तीन बाटल्या त्याला विकत घेऊन दिल्या.

” दादा लय उपकार झाले”

देवबा म्हणाला तसा तो मुलगा समाधानाने हसला. देवबा नातवांकडे आला. थंड पाण्याची बाटली पाहून नातवंडही आनंदली. त्यांनी झडप घालूनच बाटली हिसकावून घेतली आणि तोंडाला लावली. देवबानेही दुसरी बाटली उघडली आणि आपला कासावीस झालेला जीव शांत केला.

– क्रमशः भाग पहिला 

© श्री दीपक तांबोळी

जळगांव

मो – 9503011250

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ मोगऱ्याची वेणी – ☆ श्री प्रदीप केळुस्कर ☆

श्री प्रदीप केळुस्कर

?जीवनरंग ?

☆ मोगऱ्याची वेणी — ☆ श्री प्रदीप केळूसकर

सुमती चाळीतील आपल्या बिऱ्हाडी आली.. दार बंद करताना तिची नजर समोरील अलिशान बंगल्यातील स्त्रीवर पडली. चेहेऱ्यावर हलकस हसू आणत सुमतीने आपल्या चाळीतील घराचा पुढचा दरवाजा बंद केला.

समोरच्या बंगल्यातील ती सुंदर बाई तिला बऱ्याचवेळा दिसायची. या कॉलनीत एका रस्त्याच्या एका बाजूला चाळी होत्या आणि विरुद्ध बाजूला अलिशान बंगले होते. सुमतीची तळमजल्या वरची जागा, तिच्या बरोबर समोर हा मुजुमदार यांचा बंगला. बंगल्याच्या पोर्च मध्ये त्यान्च्या पाच सहा अलिशान गाड्या दिसायच्या. चार पाच नोकर घरात दिसायचे.. शिवाय ड्रायव्हर होतेच. मुजुमदार हे मोठे उद्योगपती. त्त्यांचे मीरा भाईंदर भागात मोठे रेडिमेड कपडाचे युनिट होते आणि बांद्रा दादर मध्ये शोरूम्स.

अर्थात हे तिला तिच्या नवऱ्याने अमितने सांगितलेले. तिचे लहानपण कोकणात गेलेले, माहेरी गरिबी, मोन्टेसरिचा कोर्स केल्याने मुंबईत लग्नानंतर तिला मोन्टेसरीत नोकरीं लागलेली. नवरा अमित ठाण्याला वागळे इस्टेट मध्ये एका औषध कंपनीत. ती सकाळी सातला घराबाहेर पडायची, त्याच्या आधी जेवणाचे डबे करुंन जाई.. नवरा अमित नऊ वाजता डबा घेऊन बाहेर पडे. तिची शाळा सुटली म्हणजे ती बारापर्यत घरी येई.

दुपारी बारानंतर ती एकटीच असायची. जेऊन झाले की रेडिओ लावायची.. बातम्या.. हिंदी गाणी ऐकायची. आजूबाजूला बऱ्याच जणांनी टीव्ही घेतले होते पण त्यानी अजून घेतला नव्हता.. तसे दोघांचे पगार कमी होते आणि अमितच्या घरी पैसे पाठविणे आवश्यक होते.

सुमतीला आपल्या समोरच्या बंगल्यातील स्त्रीचे कौतुक वाटे. सकाळी ती शॉर्टपॅन्ट घालून खेळायला जाई.. कधी ड्रायव्हरसह बाहेर जाई किंवा मस्त कपडे घालून गार्डनमध्ये बसलेली असे. आजूबाजूला नोकरवर्ग फिरत असे. मुजुमदार कवचितच दिसत. बऱ्याचवेळा रात्रीची ती दोघे बहुतेक पार्ट्याना जात. उशिरा घरी येत.

अशीच एका सोमवारी ती नेहेमीप्रमाणे शाळेतून आली आणि खोलीचा दरवाजा उघडता उघडता समोरच्या बंगल्यातील कुत्री मागाहून तिची साडी ओढू लागली, दचकून तिने मागे पाहिले तर कुत्री आणि तिच्यापाठोपाठ एक नोकर धावत आला.. त्या नोकराने ती कुत्री उचलली एव्हड्यात समोरची मालकीण पण गेटकडे आली. तिच्याकडे पहात म्हणाली 

“कुछ तक्लीफ नही हुई ना..

“नही तो..

“आवो ना.. घर. शरबत लेते हॆ..

“नहीं.. नही..

“आवो ना.. हमेशा देखती हूं सामने.

मगर पहचान नही..

तिच्या परतपरतच्या आग्रहाने सुमती त्या बंगल्याच्या गेटमधून आत गेली. तिने सुमतीला हॉलमध्ये नेलं.. त्या हॉलमधील श्रीमंती पाहून ती चाट पडली.. महागडे झुंबर.. गालीचे.. फार्निचर.. पेंटिंग्स. नोकर..

“बैठो.. क्या नाम तुम्हारा..

“सुमती..

” मै साधना.. साधना मुजुमदार.. हमारे गारमेंट्स के युनिट्स है और शो रूम्स है.

“हा.. मेरे पतीने बोला है मुझे..

“क्या करते है तेरे पती? नौकरी करते है क्या?

“हा.. ठाणामे एक कारखानामे..

“और तुम?

“मै टीचर हूं.

“मै देखती हूं, तुम पुरा दिन काम करती हूं.. कोई नौकरांनी नही है क्या?

“नही.. हमारे इतमी कम सॅलरी मे..

” कितना कमाते हो तुम दोनो मिलके?

“पचीस हजार..

“बस.. इतनही.. कैसा मॅनेज कर लेते हो तुमलोग..

“नौकरीमे कितना मिलेगा.. नया नया नौकरी है.. और गाव भेजना पडता है… इनके घर..

“मेरे हजबन्ट मुझे पाच लाख देते है.. लेकिन वो भी मुझे कम लगते हैं.. हर चार दिन पार्टी होती हैं.. पिकनिक्स हॆ.. मॉल पर्चेसे है..

“तुम्हारे बच्चे..

“हमने डून के स्कुल रखें है उन्हे..

“ठीक आहे.. मी जाते..

“ऐसी कैसी जायेगी.. कुछ लेना पडेगा.. क्या लेगी.. चाय कॉफी.. कोल्ड..

“नको. जाते मी.. जेवायचय..

“लेकिन लेना तो पडेगा.. पहली मुलाकतं तुम्हारी..

“कुछ कोल्ड.. औरंज ज्युस..

बाजूलाच उभा असलेला नोकर चटकन आत गेला आणि मस्त ग्लासात ज्यूस घेऊन आला. ज्युस पिता पिता साधना म्हणाली

“ये देखो सुमती.. थोडे पैसे मे कभी खूष नही होनेका.. खूशीके लिये पैसा चाहिये.. और वो आस्मानसे नही गिरेगा.. हजबंटको बोलो पैसा कमावो.. ये वीस तीस हजारमे कुछ नही होता..

“चलते मी..

म्हणत सुमती आपल्या घरी आली.

सुमतीने जेवण गरम केल आणि जेवायला बसली.. पण आज तिच्या डोक्यात साधना होती.. तिची वाक्ये परत परत तिला ऐकू येत होती..

“तुम्हारे घरमे नौकरांनी नही हॆ क्या? अकेली कितना काम करेगी.

“ये देखो सुमती,.. हजबंटको बोलो पैसा कमावो.. ये वीसतीस हजार मे कुछ नही होता ‘…..

 तिच्या मनाची कुतरओढ होत होती… जन्मापासून कोकणात लहान गावात.. वडिलांचे लहानसे हॉटेल.. त्यात काय होणार? पेज घेऊन दिवस काढले. लग्नानंतर या चाळीत.. आज श्रीमंती काय असते आणि वैभव काय असते ते पाहिले. असले वैभव आपल्या नशिबात नाही.. साधना नशीबवान.. किती गाड्या त्यापण परदेशी.. नोकरचाकर.. क्लब्स, पार्ट्या.. पिकनिक्स.. परदेशी ट्रिप्स.. मुले डूनच्या शाळेत..

साधना म्हणते ते खरे, अमित कसली नोकरीं करतो? असली नोकरीं करून कधी सुखसोयी मिळतील काय? अजून घरात टीव्ही नाही.. कोण कामाला ठेवलं तर परवडत नाही.. अमितने धडपड करायला हवी.. धंदा करायला हवा..

विचार करता करता पाच वाजले.. आता सहा वाजता अमित यायची वेळ झाली.. त्याआधी रात्रीचे जेवण.. उद्याच्या डब्याची तयारी.. भाजी मोडून ठेवायला हवी.. दळण चक्कीवार द्यायला हवं.. कपडे धुवायला हवेत.. एक का दोन.. हजार कामे.

साडेसहा वाजता अमित आला. रोज अमित आला की ती चहा करायची… मग चहा घेताघेता गप्पा दिवस भराच्या.. तो कंपनीतील गमतीजमती सांगे.. ती ऐके.. मग ती शाळेतील गोष्टी सांगे.. हा वेळ त्त्यांचा छान जायचा.

आज अमित आला तरी सुमतीने लक्ष दिले नाही.. ती पीठ चाळीत बसली. ती गप्प आणि दमलेली पाहून अमित म्हणाला..

“आज दमलीस की काय?

चिडून सुमती म्हणाली..

” एकटे माणूस दमणार नाही काय? अमितच्या लक्षात आले.. सुमती खरेच दमली आहे नाहीतर ती चिडणारी नाही..

“खरे आहे.. तुला एकटीला खुप काम पडते.. नोकरीं करून घरातील सर्व.. आपण एखादी बाई बघू तूझ्या मदतीला… “

“बाई परवडणार आहे का आपल्याला? आपले पगार ते किती?

अमितच्या लक्षात आले, सुमती खरोखर चिडली आहे आज.. नाहीतर या आधी ती अशी कधी बोललेली नाही..

“होय.. खरे आहे.. पगार काय एकदम वाढत नाही.. पण खर्च कमी करू शकतो आपण.. मी माझे खर्च कमी करतो.. म्हणजे कंपनीतील चहा बंद.. कपडे बाहेर इस्त्रीला देणे बंद.. रिक्षा बंद.. दाढी बाहेर करणे बंद.. कधी कधी मित्रासमवेत एखादी बिअर व्हायची ती बंद.. नवीन कपडे बंद. असे पैसे वाचवले की घरकामला बाई ठेऊ शकतो आपण.. नव्हे ठेऊयाच.. तू आजूबाजूला येणाऱ्या बाईकडे लक्ष ठेव आणि तिला यायला सांग.

सुमतीच्या मनात आले.. आपल्या साठी आपले छोटे मोठे खर्च बंद करू शकणारा आपला नवरा साधा आहे बिचारा.. कधी आवाज वाढवून बोलणार नाही… आपण त्याच्यावर उगाच चिडलो.

रात्री जेवताना तिने नवऱ्याला मुजुमदार यांच्या घरी गेल्याचे सांगितले आणि त्यान्च्या वैभवाचे आणि साधनाचे वर्णन केले

रोज सारखी तिला झोप येईना.. तिच्या डोळ्यासमोर मुजुमदरांचा बंगला.. गाड्या.. उंची फार्निचर येत राहिले. हिऱ्याच्या अंगठ्या घातलेली आणि फलांचा ज्युस पिणारी साधना दिसत राहिली.. मॅसिडिझ गाडीतून फिरणारे मुजुमदार दिसू लागले..

दुसऱ्या दिवशी तिचे शाळेत लक्ष लागेना.. जेवण गोड लागेना.. कसले काम करावेसे वाटेना.

अमितच्या लक्षात आले.. सुमतीने मुजुमदरांचा बंगला पाहिला त्या पासून ती अस्वस्थ आहे.. कदाचित तशी श्रीमंती तिला हवी असेल.. पण आपल्या पगारात तिला कसली सुखे देणार?

शनिवारी अमित लवकर घरी आला.. तिला म्हणाला

“चल, आज थोडे फिरून येऊ.. नवीन पार्क झाला आहे.. तो पाहू.. बाहेरच जेऊ.

ती पण खूष झाली… किती दिवसात गाडीने नाहीच पण पायी पण फिरायला गेलो नाही.. तिने तयारी केली आणि दोघे फुटपाथवरुन हातात हात घेऊन चालू लागली.. काळोख पडू लागला होता आणि रस्ते गाड्यानी.. माणसानी भरून वहात होते.. वाटेल कपड्याची, दागिन्याची दुकानें दिसली की तिचे आसूसलेले डोळे पुढे जात नव्हते.

पार्क मध्ये जाण्यासाठी त्याना रस्त्याच्या दुसऱ्या बाजूला जायचे होते.. म्हणून ती सिग्नलजवळ थांबली.. सिग्नल लागला म्हणून अनेक गाड्या थांबल्या होत्या.. सिग्नल मिळण्याची वाट पहात होत्या.. एवढ्यात तिचे लक्ष एका मार्सिंडीज कडे गेले.. ती गाडी तिला ओळखीची वाटली.. वाकून पाहिले तर मुजुमदारसाहेब मागील सीटवर होते आणि त्यान्च्या अंगाला खेटून एक टंच तरुणी त्यान्च्या खांद्यावर डोके टेकून होती..

तिने अमितला हाताने गाडीतील मुजुमदार आणि तरुणी दाखवली.

“तो बघ मुजुमदार त्या पोरीसोबत.. मजा मारतोय.. बिचारी साधना.. घरात त्याची वाट पहात असेल..

“साधना काही वाट पहात नाही त्याची.. ती एखाद्या तरुण मित्राच्या मिठीत असेल यावेळी..

‘काय? सुमती किंचाळली..

“होय.. हॆ हायफाय जीवन असेच असते.. परत कधीतरी तुला साधना पण दिसेल अशीच..

सिग्नल लागला तशी दोघे पलीकडे गेली.. पार्कच्या कोपऱ्यावर एक फुल वाला गजरे, वेण्या घेऊन बसला होता. अमितने त्या गजरेवाल्या कडून एक मोगरीची वेणी विकत घेतली आणि तिथेच सुमतीच्या केसात माळली.

दोघे पार्क मध्ये गेली.. हिरवळीवर बसली.. भेळवाल्या कडून भेळ घेऊन खाल्ली.. बर्फचा गोळा संपवीला.

 काळोख पडू लागला तशी दोघे निघाली. आता सुमती गप्प गप्प होती.. मुजुमदरांचे अंतरंग तिला कळले होते.. त्या मानाने आपण किती नशीबवान.. आपला नवरा आपल्यासोबत आहे.. घरात कामाला बाई ठेवायची म्हणून आपली काटकसर करू लागलाय… चहा बाहेर पिणे बंद केले.. दाढी, इस्त्री बाहेरचे बंद..

रात्री ती नेहेमीसारखी गप्पा मारत जेवली. अमितने तिला भांडी घासायला, ओटा पुसायला मदत केली.. भांडी स्टॅन्ड वर लावली.

रात्री झोपायला गेली.. तेंव्हा तिच्या मनात परत साधनाचे विचार येत राहिले.. कसले सुख आणि कसले काय? नवरा दुसऱ्याबाई बरोबर.. आपण?

त्यापेक्षा आपण सुखी.. पैसे कमी असले तरी एकमेकाबद्दल विश्वास आहे.. प्रेम आहे.. आज पार्क मध्ये जाताना मोगऱ्याची वेणी घेऊन दिली.. एवढेच नाही सर्व लोकांसमोर केसात माळली.

बाजूला झोपलेल्या अमितबद्दल तिच्या मनात प्रेम दाटून आले.. तिने केसातील मोगऱ्याची वेणी छातीशी धरली आणि ती शांत झोपी गेली.

© श्री प्रदीप केळुसकर

मोबा. ९४२२३८१२९९ / ९३०७५२११५२

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ आऊटसायडर … — भाग -२ ☆ डॉ. ज्योती गोडबोले ☆

डॉ. ज्योती गोडबोले 

? जीवनरंग ❤️

☆ आऊटसायडर … — भाग – २  ☆ डॉ. ज्योती गोडबोले 

(पण तुम्हाला अशी विधवा मुलगी सून म्हणून चालेल का? मला तुमच्या बरोबर रहायचं आहे. पण तुम्ही नको म्हणालात तर मग मी सुभाषशी लग्न नाही करणार. ” – – कृपाचे डोळे पाणावले.) – इथून पुढे — 

चहा घेऊन कृपा निघून गेली. सुभाष आईबाबांजवळ बसला.

“आई, ही खूप चांगली मुलगी आहे. किती लहान वयात एकटीला रहावं लागतंय ग तिला. अमिता आणि कृपा मध्ये जमीन अस्मानाचा फरक आहे आई. मी अमिताच्या वेळी केली ती चूक पुन्हा करणार नाही. कृपाशी लग्न करून मी नक्की सुखी होईन आई. मी ओळखतो तिला.”

मीना मोहनने होकार दिला आणि तिचे आईवडील आणि हे चौघे असे अगदी घरातल्या घरात लग्न करून कृपा सुभाषच्या घरात आली.

कृपा घरात आली आणि मीनाच्या घरात सुख नांदायला लागलं. कृपा आली आणि घर हसायला लागलं.

तिचा मृदु आर्जवी स्वभाव, सगळ्याना बरोबर घेऊन जाण्याची वृत्ती, कामसूपणा नीटनेटकेपणा मीनाला आनंद देऊन जाई.

कृपाला दिवस गेले आणि या आनंदात आणखी भर पडली. तिला कुठे ठेवू आणि कुठे नाही असं झालं मीनाला. कृपाला मुलगा झाला आणि मीना मोहन कृतकृत्य झाले. सुभाष कृपाचा सुकृत आजीआजोबांच्या छायेत मोठा होऊ लागला.

सुकृत दोन वर्षांचा झाला आणि कृपाच्या लक्षात आलं, गेले काही दिवस सुभाष अस्वस्थ आहे, त्याचं चित्त जागेवर नाही.

रात्री कृपाने विचारलं, “ काय झालंय सुभाष? ऑफिसमध्ये तर सगळं ठीक आहे की. का आहेस अस्वस्थ? मला सांगण्यासारखं नाहीये का ?”

सुभाष म्हणाला, “ नाही ग कृपा. मी काही तरी लपवून ठेवतो का तुझ्यापासून? गेले काही दिवस मला रोज अमिताचे मेल येतात. ‘ मला तुला भेटायचं आहे. माझं चुकलं. आपण परत एकत्र येऊ. मला पुन्हा संसार करायचा आहे तुझ्याशी. ’ ”

कृपाने स्थिर नजरेने सुभाषकडे बघितलं. “ मग तुझं काय म्हणणं आहे सुभाष? तिला सांगितलं आहेस ना, आता माझं लग्न झालंय आणि आपल्याला एक मुलगा सुद्धा झालाय हे? अजून तू गुंतला आहेस का तिच्यात?”

सुभाष म्हणाला, “ नाही ग कृपा. माझा जीव गुंतलाय तो तू आणि सुकृत मध्ये. पण ही म्हणालीय मी घरी येणार आहे तुझ्या. मी अस्वस्थ झालोय कृपा. मला ती यायला नकोय. कायद्याने रीतसर घटस्फोट झालाय आमचा. तरीही पुन्हा हे वादळ का? माझ्यावर विश्वास आहे ना कृपा तुझा?”

कृपाने त्याला जवळ घेतले… ” सुभाष, खुशाल येऊ दे तिला आपल्या घरी. मी बघते काय करायचं ते. तू निर्धास्त रहा. माझ्यावर तुझा विश्वास आहे ना? मग झालं तर. कळवून टाक अमिताला की अमुक अमुक दिवशी तू जरूर ये. , फक्त त्या दिवशी तू आईबाबा कोणीच घरी राहू नका. मावशीकडे जा तुम्ही दोन दिवस. चालेल ना? मी सगळं नीट करीन सुभाष. आपला संसार मी मोडू देणार नाही. तू कळव तिला की कृपा तुझी वाट बघतेय. तू जरूर ये. ”

ठरलेल्या दिवशी कृपाच्या दाराची बेल वाजली. दारात अमिता उभी होती

“ये ग अमिता. आत ये ना. मी कृपा. सुभाषची बायको आणि आमचा मुलगा सुकृत शाळेत गेलाय. ये ना. ”

कृपाने अमिताचं हसतमुखाने स्वागत केलं.

अमिता सोफ्यावर बसली. समोरचं पेंटिंग न्याहळत म्हणाली, छान आहे हे. ” कृपा म्हणाली आवडलं? मी केलंय हे. मला खूप आवड आहे पेंटिंगची. पण या नोकरीपायी फारसं जमत नाही हल्ली. ”

अमिता म्हणाली, “छान ठेवलं आहेस तू घर. ” मग तिने चाचरत विचारलं, सुभाषचे आईबाबा कुठे आहेत?”

कृपा हसून म्हणाली, “ अग ते सगळे मावशींच्या फार्म हाऊसवर गेलेत दोन दिवस. तू आरामात बस ग. मग जेवूया आपण. मी रजा घेतलीय आज तू येणार म्हणून. ”

अमिता म्हणाली, ” नंतर जेवू आपण. पण माझं खूप चुकलं. मी आततायीपणे घटस्फोट घेतला सुभाषशी. पण इतकी वर्षे तिकडे एकटी राहिल्यावर मला आता पुन्हा संसार करायचा आहे. तोही सुभाषशीच. मला माहीत आहे, तो किती गुंतला होता माझ्यात ते.. अजूनही मला बघताच त्याच्या माझ्याबरोबरच्या मागच्या सुंदर आठवणी नक्की जाग्या होतील. मला माझी चूक सुधारायची आहे. मी पुन्हा लग्न करीन सुभाषशी. ” अमिता खात्रीने बोलत होती.

कृपा हसली म्हणाली, “अमिता, अजूनही तू होतीस तशीच उथळ राहिलीस बघ. निर्दयपणे तू सुभाषशी मांडलेला सोन्यासारखा डाव उधळून टाकलास. त्याच्या मनाचा विचार केलास का तेव्हा? उध्वस्त होणार होता तो. मी सावरलं त्याला तेव्हा. अग, संसार म्हणजे पोरखेळ का आहे? अग बाई, त्या लहान मुली देखील मांडलेली भातुकली जीव ओतून खेळतात. किती मन गुंतते त्यांचे त्या लुटुपुटीच्या खेळात सुद्धा. , तू तर खरा मांडलेला डाव निर्दयपणे उधळून टाकलास. आणि आता परत तो मांडू म्हणतेस? तोही त्याच सुभाषशी? तू आपण होऊन या घराचा उंबरा ओलांडलास अमिता. मी तुझी जागा घ्यायला तेव्हाही नव्हते आले… चल जेवता जेवता बोलूया. भूक लागली असेल ना?”

कृपाने अमिताला किचन मध्ये नेलं.

“ बस इथं. आज मी केलाय स्वयंपाक. नाहीतर हल्ली आमच्याकडे मावशी येतात दोन्ही वेळा स्वयंपाकाला. आईना होत नाही हल्ली काम फारसं.

कृपाने अमिताचे पान वाढले… तिच्या आवडीच्या अळू वड्या, सार, आणि गुलाबजाम पानात वाढले होते.

“ जेव सावकाश. “ आपलं पान वाढून घेत कृपा म्हणाली. अमिता संकोचली.

“ जेव ग पोटभर. मैत्रीण तर होऊ शकते ना मी तुझी? बाकीचे सोड. ”

बाहेर हॉलमध्ये आल्यावर कृपा म्हणाली, ” अमिता, तू आता या घरात उपरी आहेस. तुझे स्थान तू हाताने गमावलेस. आता ते तुला पुन्हा कसं मिळेल? कबूल आहे तू रुपगर्विता आहेस. सुंदरच आहेस. मी सामान्यच आहे तुझ्यापुढे दिसायला. पण लक्षात ठेव, रूप फार दिवसाचं नाही. गुण महत्वाचे. तू पुन्हा सुभाषला या रूपाचा जोरावर जिंकून घेशील हा भ्रम आहे तुझा. आता तू फक्त आउटसायडर आहेस या घरात. सुभाष आता माझा नवरा आणि आमच्या गोड मुलाचा पिता आहे. तू पाहुणी आहेस अमिता इथे.

पाहुण्याने चार दिवस यावं, पाहुणचार घ्यावा आणि निघून जावं. घरचा यजमान होण्याची अपेक्षा धरू नये. ”

.. कृपा शांतपणे बोलत होती. “ पुन्हा असा वेडेपणा करू नकोस. यायचं तर फक्त माझी मैत्रीण म्हणून ये. पण या घरची स्वामिनी मी आहे अमिता. सल्ला ऐकणार असलीस तर ऐक. अजूनही वेळ गेलेली नाही. इतकी हुशार देखणी मुलगी तू, लग्न कर आणि सुखी हो. लहान मुली करतात तसा हाच बाहुला मला हवा असा हट्ट करू नकोस. तो तुझ्यापासून कैक योजने लांब गेलाय अमिता. नव्हे, तूच दूर लोटलास त्याला. ”

कृपाने दरवाजा उघडला… 

“ सुखात रहा अमिता आणि आपल्या सुखाची नवी वाट शोध. नक्की मिळेल तुला. ”

अमिताचे डोळे भरून आले. कृपाला गच्च मिठी मारत ती म्हणाली, “ किती शहाणी आहेस कृपा तू.

मी हरले कृपा. सामान्य असूनही तू जिंकलंस सुभाषला आणि मला हरवलंस. ”

… अमिता वेगाने दार बंद करून बाहेर पडली.

– समाप्त –  

© डॉ. ज्योती गोडबोले

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ आऊटसायडर … — भाग – १ ☆ डॉ. ज्योती गोडबोले ☆

डॉ. ज्योती गोडबोले 

? जीवनरंग ❤️

 

☆ आऊटसायडर … — भाग – १ ☆ डॉ. ज्योती गोडबोले 

सुभाष गेले पंधरा दिवस अत्यंत अस्वस्थ होता. त्याच्या मनाची सगळी शांतता ढवळून निघाली अगदी. त्याला कारणही तसंच घडलं. गेले महिनाभर त्याला सिंगापूरहून अमिताचे सतत मेल, फोन येत होते. त्याचं सुखी आयुष्य अगदी ढवळून निघालं या मेल्स आणि फोन्स ने.

मागचे दिवस आठवले सुभाषला. किती सुखात जगत होता सुभाष. मध्यमवर्गीय रहाणी, लहान कुटुंब आणि सुखी दोनच भावंडे. लहान सुभाष मोठी ताई गीता. सुभाषचे वडील जरी साध्या नोकरीत होते तरीही आईही शिक्षिका होती आणि त्या दोघांनी आपल्या गुणी मुलांना कधी काही कमी पडू दिलं नाही. फाजील लाड केले नाहीत आणि अगदी डोक्यावरही बसवलं नाही मुलांना. गीता आणि सुभाष अभ्यासात चांगले होते. , गीता कॉमर्सला गेली. आपल्या इच्छेप्रमाणे तिने मास्टर्स डिग्री घेतली आणि एका चांगल्या टॅक्स कन्सल्टंटच्या फर्म मध्ये छान जॉब करायला लागली.

यथावकाश गीताने आपलं आपण लग्न ठरवलं. इतक्या चांगल्या मुलाला आईवडील का नकार देतील? घरबसल्या छान जावई चालत आला. गीताच्या आईवडिलांनी अगदी हौसेने लग्न करून दिले. गीता आनंदात सासरी नांदायला लागली.

सुभाष अत्यंत चांगले मार्क्स मिळवून इंजिनिअर झाला. त्याला एका सॉफ्टवेअर कंपनीत चांगला जॉब मिळाला.

आई म्हणाली ”सुभाष, आता तुझं लग्नाचं बघायला लागू या ना? छान पगार मिळतोय तुला. नुकताच फ्लॅटही बुक केला आहेस. आता नाव नोंदवायचं का? तुझी तू कोणी बघितली आहेस का ? मोकळेपणाने सांग हो. ”

सुभाष म्हणाला, ”नाही ग आई. माझी काही हरकत नाही मुली बघायला. तुम्हाला योग्य वाटतील त्या मुली मी बघेन. माझा विश्वास आहे तुझ्यावर. ”

मोठ्या उत्साहाने मीनाताईंनी सुभाषचं नाव विवाहमंडळात नोंदवलं. चांगल्या मुली सांगून येऊ लागल्या सुद्धा. त्या दिवशी मीनाची बहीण मधुरा सहज भेटायला आली.

“काय ग मीना, काय म्हणते मोहीम सुभाषची?” हसून तिनं विचारलं.

“चालू आहे, बघतोय मुली. ”

“ बघतेस का एक मुलगी? छान आहे दिसायला. नवीनच आलेत आमच्या बिल्डिंगमध्ये. मला फारशी माहिती नाहीये हं. बघ तू सगळं नीट. ” पत्ता फोन देऊन मधुरा निघून गेली.

पुढच्या आठवड्यात मीना आणि सुभाष मुलगी बघायला गेले. सुरेखच होती पल्लवी दिसायला. छान नोकरी होती, बोलायला चांगली वाटली. सुभाषला आवडली पल्लवी.

त्याच्या दुसऱ्याच दिवशी साठ्यांची अमिता त्याला भेटली. हेही स्थळ विवाह मंडळातूनच आलं होतं. अमिता अतिशयच स्मार्ट, मॉडर्न आणि पहिल्याच भेटीत इम्प्रेशन पडेल अशीच होती.

सुभाष म्हणाला, ”आई मला फार आवडली अमिता. ती पल्लवी छान आहेच पण ही जास्त स्मार्ट आहे. आपण हिलाच होकार कळवूया. ”

मीना विचार करून म्हणाली.. “सुभाष, नीट विचार कर. मला ही ओव्हर स्मार्ट वाटतेय. अशा मुली संसाराला जरा कमी महत्व देतात असं माझं मत आहे. पल्लवी योग्य मुलगी वाटते मला तुझ्यासाठी. बघ. शेवटी संसार तुला करायचा आहे. ” सुभाष अमिताला चार वेळा भेटला. आणि त्याने तिला होकार द्यायचे ठरवले. पल्लवीच्या घरी, क्षमस्व असा नकार कळवण्यात आला.

एकुलती एक लाडात वाढलेली, कुठेही तडजोड करायला तयार नसणारी अमिता गोखल्यांच्या घरात सून म्हणून आली. सुभाष तर तिच्या रुपाला इतका भुलून गेला होता की तिचे दोष त्याला खटकेनात.

उशिरा उठायचं, तयार डबा घेऊन ऑफिसला जायचं. कामात सासूला मदत करायची असते हे ती लक्षातच घ्यायची नाही. पुन्हा आपल्या पगाराचे ती काय करते हे तिने सुभाषला कधीही सांगितलं नाही. अफाट खरेदी, सतत बाहेर खाणे, शॉपिंग हेच आयुष्य होते तिचे.

एकदा सहज म्हणून मीना तिच्या आईला भेटायला गेली. बोलता बोलता म्हणाली ”अहो, आता अमिताच्या लग्नाला सहा महिने झाले. अजूनही ती उपऱ्यासारखीच रहाते घरात. आमच्याशी तिचा संवादच नसतो. बाकी काम, भाजी काही सामान आणणे हे तर लांब राहिलं. ”

अमिताच्या आई म्हणाल्या, ” अहो, अलीकडच्या मुली या. मिळवत्या. त्यांच्याशी जमवून घ्यावं लागतं मीनाताई. आम्ही तिला लाडात वाढवली आहे. ती इथे तरी कुठे काम करायची? दमून जाते हो ऑफिस मध्ये काम करून. ”

मीना हताश होऊन घरी आली. नवऱ्याला म्हणाली, ” बघा. काय बोलल्या विहीणबाई. मलाच चार शब्द सुनावले. कठीण आहे बरं आपलं आणि सुभाषचं. जे जे होईल ते ते पहावे. ”

चार महिने असेच गेले.

एक दिवस अमिता उत्साहाने घरी आली. हे सांगतच की “ मला सिंगापूरला छान जॉब मिळालाय. मी पुढच्या महिन्यात तिकडे जॉईन होणार आहे. ” 

थक्क होऊन सुभाष आणि त्याचे आईबाबा बघतच राहिले.

“ अग पण मग तू एकटीच जाणार का तिकडे? मग सुभाषचं काय?”

बेफिकिरीने ती म्हणाली, ” मला संधी मिळतेय तर मी जाणार. सुभाषने यावं तिकडे आणि करावा प्रयत्न की. मिळेल की त्यालाही चांगला जॉब तिकडे. ”

सुभाष संतापून म्हणाला, ” मी अजिबात माझा हा उत्तम जॉब सोडून तिकडे येणार नाही. मूर्ख आहेस का? हातचं सोडून पळत्याच्या मागे धावायला मी मूर्ख नाहीये. तूही नीट विचार केला आहेस का अमिता? उगीच इथला जॉब सोडून तिकडे एकटीने जाऊ नयेस असं वाटतं मला. ”

अमिता म्हणाली, ”वाटलंच होतं मला. बस इथेच. मी जाणार. नवीन क्षितिज मला खुणावतंय तर मी ही संधी घेणारच. मी आईकडे जातेय आता. मला खूप तयारी करायचीय जायची. मग मी तिकडूनच एअरपोर्ट वर जाईन. येणार असलास तर ये भेटायला. माझ्या जायच्या डिटेल्स कळवीन तुला. ”

थक्क होऊन मीना आणि मोहन तिच्याकडे बघतच राहिले. अशुभाची पाल चुकचुकली मीनाच्या मनात. ठरल्यावेळी अमिता सिंगापूरला निघून गेली. सुभाष तिला पोचवायला एअरपोर्टवर गेला होता. अतिशय उद्विग्न होऊन तो घरी परत आला.

आयुष्यच बदललं त्या दिवसापासून सुभाषचं. लग्नाला वर्ष झालं नाही तोच हे खेळ सुरू झाले आपल्या नशिबाचे, असं मनात आलं त्याच्या. अमिताचे उत्साहाने भरलेले फोन, फोटो व्हिडिओ यायचे सुभाषला. सुरुवातीला तू ये ना इकडे म्हणणारी अमिता आता त्याला फोनही करेनाशी झाली. तिचा सिंगापूरलाच कायम रहाण्याचा निर्णय तिने माहेरी आणि सासरीही कळवला.

सुभाष संतापला. तिच्या आईवडिलांना भेटला. ते म्हणाले, “ उलट तूच तिकडे जायला हवंस सुभाष. चांगला जॉब मिळव आणि सुखात रहा तिकडे. पण तू जर तिकडे जायला तयार नसलास तर मात्र अमिता तुला घटस्फोट द्यायचा विचार करतेय. आम्हीही तिच्या पाठीशी कायम उभे रहाणार. ” 

सुभाष म्हणाला”, हो का? मग मलाही हवाय घटस्फोट तुमच्या लाडावलेल्या मूर्ख लेकीपासून. बस झालं आता. ”

तो तिरीमिरीने घरी आला आणि आईवडिलांना हे सगळं सांगितलं. मीना मोहन हताश झाले हे ऐकून. कमाल आहे हो या मुलीची.

“आई, यावर मला अजिबात चर्चा नकोय. तूही जाऊ नकोस आता तिच्या माहेरी. मला आवडणार नाही तू गेलीस तिकडे तर. ” मीना गप्प बसली. आपल्या मुलाच्या नशिबात काय आहे हेच तिला समजेनासे झाले.

अमिता भारतात आली आणि भरपूर मनस्ताप देऊन अखेर सुभाषला घटस्फोट देऊन पुन्हा सिंगापूरला निघून गेली.

दरम्यान बऱ्याच गोष्टी घडल्या. ऑफिस मधल्या कृपाला एक दिवस सुभाष घरी घेऊन आला.

“आई ही माझी कलिग कृपा देशमुख. मी हिला बरीच वर्षे ओळखतो. मला लग्न करायचंय हिच्याशी. ”

कृपा मीनाजवळ बसली आणि म्हणाली, “सुभाषच्या आई, मला थोडं बोलायचंय तुमच्या सगळ्यांशी. माझे मिस्टर चार वर्षांपूर्वी अपघातात गेले. मी इथे एकटीच रहाते. माझे आईवडील औरंगाबादला असतात.

मी आणि सुभाष एकमेकांना खूप वर्षे ओळखतो. पण ते फक्त टीम लीडर आणि मी सबॉर्डीनेट स्टाफ असं आमचं नातं आहे. आम्हाला सुभाष सरांची पत्नी निघून गेली, तिने घटस्फोट घेतला हे ऐकून माहीत होतं. मागच्या महिन्यात सुभाष सरांनी मला लग्नाबद्दल विचारलं. माझा निशांतशी फक्त पाच वर्षे संसार झाला हो. अचानकच एका कार अपघातात त्याचे निधन झाले. मलाही सुभाष सरांशी लग्न करावेसे वाटते.

पण तुम्हाला अशी विधवा मुलगी सून म्हणून चालेल का? मला तुमच्या बरोबर रहायचं आहे. पण तुम्ही नको म्हणालात तर मग मी सुभाषशी लग्न नाही करणार. ” कृपाचे डोळे पाणावले.

– क्रमशः भाग पहिला 

© डॉ. ज्योती गोडबोले

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ “वासुदेव…” ☆ श्री मंगेश मधुकर ☆

श्री मंगेश मधुकर

🔆 जीवनरंग 🔆

☆ “वासुदेव…” ☆ श्री मंगेश मधुकर

रविवारची आळसावलेली सकाळ, सात वाजण्याच्या सुमारास सोसायटीत झाडावरच्या पाखरांचा किलबिलाट आणि ये-जा करणाऱ्या गाड्यांचा आवाज सोडला बऱ्यापैकी शांतता. जॉगिंगवरुन परतलेले आकाश, कुणाल बाकावर मोबाइलवर गेम खेळण्यात मग्न होते. तितक्यात “वासुदेव आला हो वासुदेव आला”असं खणखणीत आवाजात ऐकायला येऊ लागलं आणि अंदाजे चाळीशीचा एक माणूस वासुदेवाच्या वेषात सोसायटीत आला. सुरेल आवाजात पारंपारिक गाणी म्हणत होता. ऐकायला फार छान वाटत होतं. काही वेळानं वासुदेव विश्रांतीसाठी बाकावर बसले. तेव्हा त्यांच्याकडे पाहून आकाश-कुणाल छदमीपणे हसले.

“यांचं बरंयं”आकाश.

“कुणाचं! ! ”कुणालनं विचारलं.

“अरे यांच्याबद्दल बोलतोय. शिक्षण नाही. नोकरी नाही. दिवसभर गाणी म्हणत फिरायचं. पैसे मिळतात आणि खायलाही म्हणतं. डबल फायदा! ! ”आकाश.

“हळू बोल. त्यांनी ऐकलं तर फालतूची लफडी होतील. ”

“खोटं काय बोलतोय. सालं, हाल तर आपल्यासारख्यांचे आहेत. जीव तोडून अभ्यास करून चांगले मार्क्स मिळवले पण काय उपयोग??चार महीने झाले अजूनही जॉबच शोधतोय. ”आकाश 

“खरंय यार! ! ”कुणालनं दुजोरा दिला. जवळच असलेल्या वासुदेवांनी दोघांचे बोलणं ऐकलं पण प्रतिक्रिया दिली नाही तेव्हा न राहवून आकाशनं थेटच विचारलं “बाबा, नशीबवान आहात”

“खरंय. म्हणून एवढं पुण्याचं कार्य हातातून घडतंय”वासुदेव प्रसन्न हसत म्हणाले.

“दारोदार फिरणं हे चांगलं काम??. ”आकाश 

“याला भीक मागणं म्हणतात”कुणाल.

“हे काम आम्ही पिढ्यान पिढ्या करतोय”

“पूर्वजांनी केलं म्हणून तुम्ही पण तेच करता. धन्य आहे तुमची! ! ”आकाश.

“या सगळ्या आता गोष्टी आऊटडेटेड झाल्यात. लोकांचा रिस्पॉन्स सुद्धा मिळत नाही आणि तरीही हे करता. ऑड वाटत नाही. ”कुणाल.

“जमाना बदललाय म्हणून तर करतोय”वासुदेव.

“म्हणजे. समजलं नाही. ”

“जाऊ दे ना. तुला काय करायचं”आकाश वैतागला.

“एक मिनिट. जरा बोलू दे रे. दिवसभर फिरून होणाऱ्या कमाईवर घर चालतं”

“कसली कमाई???मी कोणाकडून काहीही घेत नाही. ”वासुदेव.

“अरे बाप रे! ! ”कुणाल पुढे काहीच बोलू शकला नाही.

“चांगले धडधाकट आहात दारोदार फिरण्यापेक्षा नोकरी करा. असं वणवण फिरून काय मिळणार”आकाश.

“वासुदेवाच्या रूपात समाधान आणि ऊर्जा मिळते. तुमच्या भाषेत सांगायचं तर फुल एनर्जी. ”

“रोज असं फिरून कंटाळा येत नाही”

“फक्त विकेंडला फिरतो”

“तरीच मी विचार करतोय की घर चालतं कसं?”कुणाल.

“कोणत्या कारखान्यात नोकरी करता”

“आय एम आय टी प्रोफेशनल, मल्टीनॅशनलमध्ये सिनियर मॅनेजर आहे”वासुदेवाचं ऐकून आकाश-कुणाल ताडकन उभे राहिले. नक्की काय रिऍक्ट व्हावं हेच लक्षात न आल्यानं फक्त एकटक पाहत राहिले.

“काय झालं. असे का पाहताय”

“सर, माफ करा. आम्ही मूर्खा सारखं बोललो. चूक झाली रियली सॉरी! ! ”आकाश.

“मी पण सॉरी! ! ”कुणाल.

“ईट्स ओके”

“एक विचारू. चांगला जॉब आहे मग हे वासुदेवाचं रूप??”

“स्वतःच्या आनंदासाठी आणि पिढ्यान पिढ्या चालत आलेली परंपरा टिकवण्यासाठी. पणजोबांपासूनचा वारसा चालवतोय. ”

“तेव्हा ठीक होतं आता कशाला?”

“काळाच्या ओघात वासुदेव सुद्धा लुप्त होईल. नवीन पिढीला माहिती व्हावी म्हणून छोटासा प्रयत्न आणि हा वारसा पुढे नेणारा आमच्या घराण्यातला कदाचित मी शेवटचाच असेल. ” 

“असं का?”

“झेड जनरेशन मधला माझा मुलगा हे करेल की नाही याविषयी खात्री नाही. ”

“आजच्या काळातसुद्धा परांपरा टिकवण्यासाठी प्रयत्न केले जातात हे कोणी सांगितलं असतं तर विश्वास बसला नसता. यु आर संपली ग्रेट! !

“ग्रेट वैगरे काही नाही मित्रांनो, यात माझाही स्वार्थ आहे. हा वारसा मिळाला म्हणून स्वतःला खूप भाग्यवान समजतो. पूर्वजांसारखं पूर्णवेळ हे काम करू शकत नाही कारण त्यावेळची परिस्थिती वेगळी आणि आताची तर फारच वेगळी आहे. म्हणून शनिवार-रवीवारचा थोडा वेळ देतो. हे कर असं कोणीही सांगितलं नाही की बळजबरी केली नाही. सगळा स्वखुशीचा मामला. नोकरी पोटापाण्यासाठी आणि हे स्वतःसाठी करतो. छंद म्हणा हवं तर….. लहानपणी वडिलांना पाहिलंय. सगळी गाणी तोंडपाठ आहेत. आजकाल इतरांसाठी जगताना स्वतःसाठी फार काही करत नाही. म्हणूनच स्वतःला रिचार्ज करण्यासाठी करतो. रुटीन कामासाठी एनर्जी मिळते. छान वाटतं”

“तुमचा हेवा वाटतो”आकाश.

“का?”

“परंपरा आणि आधुनिकता यांची सुंदर सांगड घालून आनंदी आयुष्य जगताय. ” आकाश.

“याविषयी घरच्याचं काय मत आहे आणि महत्वाचं म्हणजे लोक काय म्हणतील हा विचार डोक्यात आला नाही”कुणाल.

“घरच्याचा पूर्ण पाठिंबा आहे म्हणूनच हे शक्य आहे आणि लोकांचं फार मनावर घ्यायचं नाही कारण ते काहीतरी म्हणणारच. ”

“एक विनंती”

“सेल्फी” वासुदेव 

“हो आणि परवानगी असेल तर व्हिडिओसुद्धा.. ”

“अवश्य करा. त्यानिमित्ताने वासुदेवाविषयी लोकांना माहिती होईल. ”आकाशनं शूटिंग सुरू केल्यावर तल्लीन होऊन वासुदेव गायला लागले…..

“उजळून आलं आकाश रामाच्या पारी,

अन गाव जागवीत आली वासुदेवाची स्वारी.

वासुदेव आला हो वासुदेव आला,

सकाळच्या पारी हरीनाम बोला,

वासुदेव आला हो वासुदेव आला” 

© श्री मंगेश मधुकर

मो. 98228 50034

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ धुकं – भाग २ (भावानुवाद) – डॉ हंसा दीप ☆ सौ. उज्ज्वला केळकर ☆

सौ. उज्ज्वला केळकर

? जीवनरंग ?

☆ धुकं – भाग २ (भावानुवाद) – डॉ हंसा दीप ☆ सौ. उज्ज्वला केळकर

डॉ. हंसा दीप

(मागील भागात आपण पाहिले – आज गाडीने ठोकर मारल्याची बातमी ऐकूनही ती गप्प बसली. शांत रहाण्याचा हा पहिला अनुभव होता. ओरडण्याने आज पर्यंत काही

फरक पडला नव्हता. जे व्हायचं होतं, ते होऊन गेलं होतं. काहीही म्हंटलं, तरी खर्च काही थांबणार नाही. शांतपणे तिने ही बातमी पचवली. आतल्या आत खूप

गुदमरल्यासारखं झालं. स्वत:शीच संघर्ष केला. गप्प बसण्याची शपथ घेतली. जर मन शुद्ध असेल, तर ते काम चांगलंच असतं. पवित्र असतं. आणि…. आणि एका नव्या

आईचा जन्म झाला. – आता इथून पुढे)

एका आईचा नव्याने जन्म झाला खरा, पण ही गोष्ट कुणाच्याच गळ्याखाली उतरली नाही. घरात इन मीन चार माणसे. दोन मुले, दोन मोठी. आई-बाप-भाऊ-

बहीण. तिघे जण एका बाजूला होते, तर दुसरीकडे आई. आईचं म्हणणं म्हणजे वटहुकूमच असायचा. सक्तीने त्याचं पालन व्हायचं. सगळे आईला घाबरायचे. समोर

काही बोलायचे नाहीत, पण तिच्यामागे तिच्याकडे रागाने पहायचे. आता ही नवी आई सगळ्या घरासाठी अपरिचित होती. इतकी वर्षे त्या वातावरणात राहायची सवय झाली होती.

चर्चेचा मुद्दा असा होता – ‘असं काय झालं की आई, आई राहिली नाही. ’

‘आई, तू माझ्यावर ओरड. तुझ्या गप्प बसण्याने मला माझी चूक सतत सतावते. ’

आईला राग येण्याचे सतत प्रयत्न केले जात होते. ‘आई, सगळ्या फाईल्स डिलीट झाल्यात.

‘इस्त्रीमुळे पॅंट जळाली. ’

‘अवीचा परीक्षेत खूप खालचा नंबर आला. जेमतेम पास झाला. ’

आईला राग नाही आला, तर नाहीच आला. गोल मेज सभा झाली. जसं काही आई बेहोश होऊन कामातून गेलीय आणि अनेक गोष्टींची तिला आठवण करून देत

तिला शुद्धीवर आणायचा प्रयत्न चालू आहे. कुठल्याच उपायाचा उपयोग झाला नाही. इकडे आई पूर्णपणे शुद्धीवर होती. स्वैपाक करत होती. जेवत होती. पण नेहमीसारखं

पुन्हा पुन्हा सांगत नव्हती, की ‘नीट जेवा. ’

‘तुम्ही लोक बाहेरचं जेवण मजेत जेवता. घरचं जेवण आवडत नाही तुम्हाला. ’

‘पौष्टिक जेवण आहे. स्वाद बघू नका. त्याचे गुण बघा. ’

हे सगळं इतिहासाच्या पानांवर अंकित झालेलं होतं. सगळ्यात अवी बेचैन होता.

‘बाबा, आज-काल घरात असं वाटतय, की हे घर नाही, शांतिनिकेतन आहे. ’

‘जसं काही शांतिनिकेतनमध्ये तू राहून आला आहेस! इलाने भावाची तंगडी ओढली.

‘राहिलो नाही, म्हणून काय झालं? त्याबद्दल खूप वाचलं आहे. साउथ एशियन स्टडीज़ हा माझा एक विषय आहे. ’

‘बाबा, आईला डॉक्टरांकडे घेऊन जाऊ या. ’

‘अशा स्थितीत ब्रेन हॅमरेजसुद्धा होऊ शकतो. ’

‘तिच्या डोक्यात काही शिरतच नाही. ’

‘आईला सांभाळलं पाहिजे तिला राग आणायला पाहिजे. ’

दोघे बहीण-भाऊ रोजच्या कटकटीने वैतागत होते. आता शांततेमुळे वैतागले. आम्ही स्वार्थी आहोत, तर आहोत. आम्हा घरातल्या लोकांचा आईसाठीचा दुराग्रह योग्य

असेल, वा नसेल, पण आई तर दटावणी देणारीच असायला हवी ना! तिच्या दटावणीतही केवढं प्रेम असतं. हे आईचं थंडपणे ‘ठीक आहे’, असं म्हणणं सतत

सुरीसारखं टोचत रहातं. जेव्हा आई सारखी ओरडत होती तेव्हा अवीच जास्त तक्रार करायचा आणि आता आई शांत आहे, गप्प बसली आहे, तरीही तोच जास्त तक्रार करतो आहे. शेवटचं हत्यार होतं त्याच्यापाशी. त्याने नळ सुरू केला आणि तसाच चालू ठेवला. म्युझिक सिस्टीम चालू केली. ती इतकी जोरात, की ऐकणार्‍याचे कान फाटले पाहिजेत.

तिघेही जिथे उभे होते, तिथून हसायला लागले. असं वाटू लागलं की दोन दिवसापासून दाटलेलं धुकं, कुंदपणा आता सरेल आणि ढगाआडून सूर्य आग ओकू लागेल. आईने गुपचुप जाऊन म्युझिक सिस्टीम बंद केली आणि शांतपणे म्हंटलं,

‘ज्याने नळ उघडा टाकलाय, त्याने तो बंद करावा आणि फारशी पुसून काढावी. ’

अवीने पळत जाऊन नळ बंद केला. गडबडीत तिन्ही फारशा स्वच्छ करू लागला. जेवढा परिणाम आईच्या ओरडण्याचा होत नव्हता, त्यापेक्षा किती तरी जास्त परिणाम हा कोमल आणि मुलायम आवाज करत होता.

‘कोणत्या गोष्टीने नाराज आहेस का? की डोकेदुखी किंवा तापावरची चुकीचे औषध तर घेतले नाहीस ना! ’ बाबांनी अखेर बेचैन होऊन विचारलेच.

‘मी नाराज नाही की आजारीही नाही. खरं सांगायचं तर मी आत्ता ठीक झाले आहे. ’

तिघांचे डोळे उत्सुक होते. कान ऐकत होते – ‘मी तुम्हा सगळ्यांची इतकी काळजी करता करता तुम्हा सगळ्यांनाच दु:खी करते. माझ्या लक्षातच आलं नाही, की

तुम्ही आता लहान मुलं राहिली नाही आहात. तुम्ही आता मोठे झालात. आपली काळजी घेऊ शकता. आपले निर्णय स्वत: घेऊ शकता आणि तुमचे बाबा, तेही

माझ्यापुढे बालक बनूनच राहीले. आता तुमच्या कामांची जबाबदारी तुमची स्वत:ची. काही चुकीचं केलंत, तर ते तुमचं तुम्हीच सुधारायचं! ’

तिघे जण आवाक झाले होते. आई रागावायची म्हणून खुश नव्हते, आईच्या गप्प बसण्यावरही नाही. धुकं शा तर्‍हेने निवळलं होतं, की आईसाठी आकाश स्वच्छ

करून गेलं होतं. आता घर स्वयं अनुशासित होतं. प्रत्येकाने आपापली जबाबदारी स्वत: घेतली होती. पण तरीही तिघे जण, धुकं निवळण्याच्या थोड्याशा आशेने आपल्या आपल्या आकाशाकडे लक्षपूर्वक बघत रहात.

– समाप्त –

मूळ हिन्दी कथा – “कुहासा“

मूळ लेखिका : डॉ. हंसा दीप, कॅनडा 

संपर्क – Dr. Hansa Deep, 22 Farrell Avenue, North York, Toronto, ON – M2R1C8 – Canada

दूरभाष – 001 + 647 213 1817  ईमेल  – hansadeep8@gmail.com

मराठी भावानुवाद : सौ. उज्ज्वला केळकर 

संपर्क – निलगिरी, सी-५ , बिल्डिंग नं २९, ०-३  सेक्टर – ५, सी. बी. डी. –  नवी मुंबई , पिन – ४००६१४ महाराष्ट्र

मो. 836 925 2454, email-id – kelkar1234@gmail.com 

≈संपादक –  श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ धुकं – भाग १ (भावानुवाद) – डॉ हंसा दीप ☆ सौ. उज्ज्वला केळकर ☆

सौ. उज्ज्वला केळकर

? जीवनरंग ?

☆ धुकं – भाग १ (भावानुवाद) – डॉ हंसा दीप ☆ सौ. उज्ज्वला केळकर

डॉ. हंसा दीप

आज नक्कीच विटेला वीट टक्करणार. आरडा-ओरड्याचा आवाज येणार. घरात भांडणं होणार. घटनेची गंभीरता लक्षात घेता तीक्ष्ण आणि धारदार वाद-वितंडवाद होणार, याची सगळ्यांना खात्री होती. पण प्रत्यक्षात तसं काहीच घडलं नाही.

भिंती शांत होत्या. कुठेच भड-भड, खड-खड झाली नाही. घरातली सारी भांडी गुपचूप आपआपल्या जागी बसलेली होती. रोटयांच्या कडाही चमकत होत्या. जाळल्याची कुठे नामोनिशाणीही नव्हती.

इतकी शांतता का होती? अवीने गाडी धडकवली होती. पांढरी मर्सिडीज गाडी. बाबांची जान आणि आईची शान. वादळ येऊ घातलं होतं. ‘कितीदा सांगितलं तुला, गाडी नीट ल्क्षपूर्वक चालव. हजारदा सांगितलं तुला, गाडी चालवताना रस्त्याकडे फोकस कर. फोनवर बोलण्यास मनाई आहे. ऐकतं कोण? इयर फोन लावून बोलत असतोस. लक्ष विचलित होणारच ना! ’ 

‘आता घ्या. इतक्या चांगल्या, महागड्या गाडीची वाट लावलीस. ’

‘गाडीचा नेम ब्रॅंड पाहून दुरुस्त करणारे वाटेल ती किंमत सांगतील! कुठून आणायचा इतका पैसा?’ 

हे सगळं आईकडून बोललं जायचं होतं. बाकी सगळ्यांनी गप्प बसून ऐकायचं होतं. रागारागाने बाबा बाहेर निघून जाणार होते. अवीला बाईक स्टार्ट करून निघून जायचं होतं. इलाला आपल्या पुस्तकात डोकं खुपसून बसायचं होतं. पण क्रियेची प्रतिक्रिया न होता घर शांत होतं.

अवीने खुणेनेच बाबांना विचारले, ’ आई ठीक आहे ना?’

बाबांनी मूकपणेच उत्तर दिले, ‘थांब जरा, आत्ता सुरू होईल तुझी खिचाई! ’

अवी विचार करत होता, ‘जे बोलायचं आहे, ते लवकर बोलून टाक आई. हे बेचैन क्षण लवकर संपूदेत आणि मला इथून लवकर बाहेर पडता येऊ दे. ’ 

अवी, बाबा, आणि इला तिघे वाट वाट होते. डोळ्यांच्या कोपर्‍यातून बघत होते. की आईचा राग आत उसळून उसळून लाव्हासारखा फटकन बाहेर येईल. तेव्हा त्यात जळून तिघांच्या अंतरातील गर्मी थंड होईल.

बाबांनी आईला उकसत म्हंटलं, ’अग, ऐकलस का? याने गाडीने धडक मारली. सगळं बॉनेट खराब झालं! ’

‘हं! ’

‘आणि बाबा, तुम्ही मिठाई खाताय. ’ अवी मोठ्याने म्हणाला, म्हणजे आईला नीट ऐकू येईल.

‘होय. गाडीचं टेंशन आहे. टेंशनमध्ये गोड खाल्ल्याने शांत वाटतं. ’ बाबांनी विनाविलंब आपली बाजू मांडली.

आई, जशी पुतळाच बनली होती. भावविहीन चेहरा. जसं काही कुठल्याही गोष्टीचा तिच्यावर परिणामच हहोत नाहीये. आईच्या या नि:शब्दतेने घराच्या भिंती विरूप वाटू लागल्या होत्या. एकदम उजाड. अपमान, उपहास, टीका-टोमणे, आरडा-ओरड्याचा तो कारखाना, न थांबणार्‍या मशीनसारखा धडधड चालायचा, तो आज ठप्प झाला होता. एक तास असा गेला.

घरच्या तिन्ही सदस्यांनी बाहेरच्या खोलीत जाऊन मीटिंग घेतली. ‘आईचं असं गप्प बसणं कुठल्या आजाराचं लक्षण तर नाही न?’ 

‘चुकून कुठलं चुकीचा औषध तर घेतलं नाही ना, जे डोक्याच्या नसाच बदलून टाकेल. ’ 

‘बाबा काही तरी चुकीचं घडलय आईच्या बाबतीत. ‘ 

‘आपल्याला लगेच हॉस्पिटलमध्ये जायला हवं’ आईच्या लाडक्या इलाच्या कपाळावर चिंतांचं जाळं उमटलं.

प्रत्येक वेळी ‘ठीक आहे, ’ असं आईचं उत्तर सामान्य नव्हतं. दोन्ही मुले आणि त्यांचे बाबा हा गुंता सोडवण्याचा प्रयत्न करत होते. बाबांसाठी आईच्या खांद्यांचा मोठा आधार होता. तिचं मुलांना रागवणं, ओरडणं बाबांचा राग बाहेर निघण्याला मादत करत होतं. एक तर स्वत: मुलांच्या नजरेत वाईट ठरत नसत. पण पत्नी बोलत असल्यामुळे त्यांचं ब्लडप्रेशर सामान्य होत असे. जेव्हा स्वत: बोलायचे, तेव्हा बी. पी. वाढायचं आणि मग नॉर्मलला यायला खूप वेळ लागायचा. त्यामुळे त्यांच्या गप्प बसण्याने एकाच वेळी अनेक फायदे होत असत.

आज मुलांची आई गप्प बसली होती. बाबांचं सगळं लक्ष तिचाकडे होतं. अनेक विचारांनी गोंधळलेलं मन कुठल्याही ठोस परिणामाशी येऊन पोचत नव्हते. अखेर, तिला झालं तरी काय? इतकी विरक्ती फक्त मृत्यूच्या आधी येते. मग काय, तिचा शेवट जवळ आला की काय? तिच्याशिवाय हे घर कसे चालेल? खाणे-पिणे, कपडे-लत्ते, रागावण्या-ओरडण्यापासून ते अनुशासनापर्यंतची जबाबदारी बाबांना आणि मुलांना पेलवणारी नाही.

आईच्या विचारात आज सूर्य पश्चिमेकडे उगवला होता. स्वत:ला तोलून बघू लागली होती. घरातल्या तिन्ही सदस्यांची काळजी घेता घेता थकली होती. घराची गाडी रुळावर ठेवण्याच्या प्रयासात तिचा स्वत:चा स्वभावाच बदलून गेला होता. रागावणं, संतापणं, ओरडणं हे सगळं, सतत चालू राहायचं. सारी इंद्रीय, चैतन्यावस्थेतही चेतनाशून्य होऊन जायची. आतला देव झोपायचा आणि दैत्य जागा व्हायचा. तेव्हा घर, घर न होता त्रासघर बनायचं. आईला स्वत:ला या वागण्याचं दु:ख व्हायचं. आपाल्यांच्याच वर रागावून ती कशी खुश होणार? तिला स्वत:चाच राग यायचा. मुलांची काळजी वाटायची. दोन्ही तर्‍हेने ती तुटून जायची. सगळ्यांना खूश बघण्याच्या प्रयत्नात सगळ्यांना दु:खी करायची आणि स्वत:देखील दु:खी व्हायची.

आज पूजा करून उठली, तेव्हा ती खूप थकलेली होती. शारीरिक नाही, मानसिक थकवा होता तो. आता तिला शांती हवी होती. तिने विचार केला, का ओरडायचं, ? कुणासाठी ओरडायचं, ? माणसाने चूक केली, स्वत: समजून घ्यावी. नाही समजला तर ठोकर खाईल. पडला, तर आपला आपण उठेल आणि स्वत:ला सावरायचा प्रयत्न करेल. जो करेल, तो भोगेल. मग जाणेल. आपलेपणालाच निष्ठूरतेने अस्वीकृत केलं. जेव्हा दु:खही राहिलं नाही, तेव्हा रागही उडून गेला. त्यामुळेच आज गाडीने ठोकर मारल्याची बातमी ऐकूनही ती गप्प बसली. शांत रहाण्याचा हा पहिला अनुभव होता. ओरडण्याने आज पर्यंत काही फरक पडला नव्हता. जे व्हायचं होतं, ते होऊन गेलं होतं. काहीही म्हंटलं, तरी खर्च काही थांबणार नाही. शांतपणे तिने ही बातमी पचवली. आतल्या आत खूप गुदमरल्यासारखं झालं. स्वत:शीच संघर्ष केला. गप्प बसण्याची शपथ घेतली. जर मन शुद्ध असेल, तर ते काम चांगलंच असतं. पवित्र असतं. आणि…. आणि एका नव्या आईचा जन्म झाला.

— क्रमशः भाग पहिला 

मूळ हिन्दी कथा – “कुहासा“

मूळ लेखिका : डॉ. हंसा दीप, कॅनडा 

संपर्क – Dr. Hansa Deep, 22 Farrell Avenue, North York, Toronto, ON – M2R1C8 – Canada

दूरभाष – 001 + 647 213 1817  ईमेल  – hansadeep8@gmail.com

मराठी भावानुवाद : सौ. उज्ज्वला केळकर 

संपर्क – निलगिरी, सी-५ , बिल्डिंग नं २९, ०-३  सेक्टर – ५, सी. बी. डी. –  नवी मुंबई , पिन – ४००६१४ महाराष्ट्र

मो. 836 925 2454, email-id – kelkar1234@gmail.com 

≈संपादक –  श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ बैल गेला नि झोपा केला… + संपादकीय निवेदन – सुश्री शीला पतकी – अभिनंदन ☆ सम्पादक मंडळ ई-अभिव्यक्ति (मराठी) ☆

सूचना/Information 

(साहित्यिक एवं सांस्कृतिक समाचार)

सुश्री शीला पतकी 

💐 अ भि नं द न 💐

“युवा विवेक” या पुणेस्थित संस्थेतर्फे “म्हणींच्या गोष्टी” या नावाने आयोजित केलेल्या एका वेगळ्याच प्रकारच्या कथा स्पर्धेत आपल्या समूहातील ज्येष्ठ लेखिका / कवयित्री सुश्री शीला पतकी यांच्या “बैल गेला नि झोपा केला” या कथेला सर्वोत्कृष्ट कथा म्हणून पुरस्कार प्राप्त झाला आहे. या पुरस्काराबद्दल आपल्या सर्वांतर्फे सुश्री शीला पतकी यांचे मनःपूर्वक अभिनंदन आणि पुढील अशाच यशस्वी साहित्य-प्रवासासाठी हार्दिक शुभेच्छा..💐

आजच्या अंकात वाचूया ही पुरस्कारप्राप्त कथा.

संपादक मंडळ

ई अभिव्यक्ती मराठी

🌸 जीवनरंग 🌸

☆ बैल गेला नि झोपा केला… ☆ सुश्री शीला पतकी ☆

शेवटचा पेपर संपून संध्याकाळी सगळी मुले नाना आजोबांकडे आली त्यावेळेस सगळेजण समीरला चिडवत होते तो बिचारा अगदी रडकुंडीला आलेला. नानानी विचारलं, “काय रे काय झालं ?”समीर खाली मान घालून उभा” नाना आजोबा माझा पेपर बुडाला म्हणजे आज शेवटचा दिवस होता ना म्हणून सकाळी पेपर ठेवला होता आणि मला वाटलं नेहमीप्रमाणे दुपारी आहे मी दुपारी गेलो माझ्या लक्षात नव्हते आणि त्यामुळे आता माझा पेपर बुडाला पेपर झाल्यावर मी शाळेत गेलो”. त्यावर नाना म्हणाले” अरेरे! म्हणजे तुझं असं झालं… पेपर गेला आणि समीर आला..! तुझ्यावरून आता ही नवीन म्हण पडेल “.. म्हण म्हणजे काय हो आजोबा? सगळ्या मुलांनी एक सुरात विचारले. नाना म्हणाले “अरे एखादी घटना अगदी थोडक्यात सांगण्याचे साधन म्हणजे म्हण! अशा म्हणी आम्ही खूप वापरत असू तुमच्या पिढीला हे माहिती नाही. ” पण म्हण म्हणजे काय? नाना म्हणाले म्हण म्हणजे.. नाचता येईना अंगण वाकडे… नाव सोनुबाई हाती कथलाचा वाळा.. अंथरून पाहून पाय पसरावे.. इकडे आड तिकडे विहीर याला सगळ्याला म्हणी असे म्हणतात. अशाच एखाद्या गोष्टीवरून ती म्हण पडलेली असते. गोष्टीवरून म्हणल्याबरोबर मुले जोराने म्हणाली “मग आम्हाला एखादी गोष्ट सांगा ना” आजोबा म्हणाले” हो सांगतो ना बसा बसा सगळे बसा.. पेपर कसे गेले सगळ्यांना?” छान गेले आजोबा”. तोपर्यंत आतून आजी म्हणाल्या पोरांनो तुमच्या आजोबांची गोष्ट होईपर्यंत मी मस्त भेळ तयार करते मग भेळ खाऊन जारे…! पोरं तर आनंदाने उड्याच भरायला लागले. सगळ्यांनी एकच गल्ला केला. सांगा ना आजोबा सांगा ना आजोबा अरे हो सांगतो. आजोबा सांगू लागले..

खवणी नावाचे एक गाव होते. त्या तिथे जीवाजी नावाचा शेतकरी राहत होता. भरपूर शेती होती मळा होता जिवाजी खूप कष्ट करणारा शेतकरी आपला मळा त्याने सुंदर केला होता. त्याच्याकडे सोन्या आणि तान्या अशी दोन बैलं होती त्याच्यावर जिवाजीचा फार जीव होता जिवाजी म्हातारा झाला आणि मुलगा शेती करायला लागला मुलाचं नाव होतं तानाजी तानाजीला ही शेतीतलं ज्ञान चांगलं होतं. पण थोडासा आळशी होता तेथे काम वेळेवर करावे ही पहिल्या पिढीतली शिकवण तानाजी कडे नव्हतीच त्यामुळे जिवाजीला थोडा राग पण यायचा. अरे शेतीत कामे वेळेवर केली पाहिजेत बाबा. पण तो म्हणायचा करतोय ना त्यापुढे जिवाजी काहीच बोलत नसे. जीवाजीचे दोन बैल ज्या झापेत बांधायचे तो झापा पडला होता आणि जिवाजी रोज तानाजीच्या मागे लागायचा अरे झापा नीट करून घे नवा बांध तो म्हणायचा सध्या खूप काम आहे. दुपारी तो बैलांना झाडाखाली बांधायचा आणि रात्री घराच्या पुढे आलेल्या पत्रात जवळपास वर्षभर हे चालले होते पावसाळ्यात बैलांना पाऊस लागे चिखलात उभं राहावं लागलं उन्हाळ्यात वरून ऊन मारत होतं आणि थंडीत थंडी वाजली. बैल कंटाळले होते पण तानाजीला वेळ नव्हता बैल एकदा असेच झाडाखाली एकमेकांशी बोलत होते ते म्हणाले आपला मालक जीवाजी आपल्यावर किती प्रेम करत होता आणि हा मुलगा आपल्याला एक डोक्यावर छप्फर बांधून देत नाही किती दिवस आपण चिखलात मातीत पाण्यात उभे राहायचं बरं ?.. आपण येथून पळून जाऊ. दुसऱ्या दिवशी रात्री दोन्ही बैल दावं तोडून पळून गेले जिवाजी सकाळी पाहतो तर झाडाखाली बैलं नाहीत शेतातही कुठे दिसेना बैलाच्या गळ्यात बांधलेल्या घुंगराचा आवाज सकाळी ऐकल्याशिवाय जिवाजीला चैन पडत नसे. त्याने सगळ्यांना बैल हुडकायला चारी दिशांना पिटाळलं. संध्याकाळपर्यंत बैल कोणालाही सापडले नाहीत. जिवाजींन तानाजीला सांगितलं तानाजी अरे बैलांची सुद्धा काळजी घ्यावी लागते घरातल्या माणसाप्रमाणे तू त्यांची वर्षभर अबदा केलीस.. किती सोसणार मुक जनावर बिचारे… जिवाजी खूप रागावला. तानाजीला खूप वाईट वाटलं खरंच आपण चुकलो त्यानं दुसऱ्या दिवशी दिवसभर खपून मोठे डाम रोऊन घेतले होते भोवताली पट्ट्या लावून तुराट्या बांधून घेतल्या चिखला न लिंपून घेतल्या. गवताच्या पेंढ्या लावून वरच्या बाजूला छप्पर केल जमिनीपासून वर एक फुटावर घेतल्यामुळे ते छान दिसत होत. त्यांन जिवाजीला बोलवून दाखवलं बाबा कसा गोठा चांगला झालाय बघ. बा म्हणाला, पण आता त्याचा उपयोग काय बैल गेला अन झापा केला अशी तुझी गत झाली. सुदैवानं दुसऱ्या दिवशी संध्याकाळी जिवाजीच्या ओढीन बैल घराकडे परतले. त्यांच्या गळ्यातल्या घुंगराचा आवाज ऐकून जीवाची खुश झाला. जिवाजीच्या बायकोन रकमाना त्या बैलांना ओवाळलं. पाणी पाजलं. गुळ अन भाकरी खाऊ घातली आणि बैल नव्या झाप्यात जाऊन उभे राहिले. तानाजीने त्यांना बांधलं. चारा टाकला. पाण्याच्या बादल्या ठेवल्या आणि त्यांन त्या दोन्ही बैलांना अक्षरशः गळ्याला लावले त्यांच्या अंगावर हात फिरवत तो म्हणाला आता मला सोडून जाऊ नका बाचा जेवढा जीव आहे तेवढाच माझा बी जीव आहे तुमच्यावर… जिवाजी हे लांबून पाहत होता जिवाजीचे गडी तानाजीला म्हणाले मालक आता बैल गेला आणि झापा केला असं करू नका बरं आपल्या बाच जरा ऐकत चला. हो रे बाबांनो चूक झाली माझ्याकडून आता पुन्यांदा अशी चूक होणार नाही.

– – आणि या प्रसंगातून एक म्हण तयार झाली ” बैल गेला अन झापा केला. ” आता आपल्या समीरला पण एक म्हण तयार होईल ना नाना! कोणती रे? तीच ती मगाशीच तुम्ही म्हणालात ना ” पेपर झाला आणि समीर गेला “.. सगळे मोठ्यांना हसायला लागले. तोच आजीने हाक दिली ‘ चला रे भेळ खायला या आत मध्ये ‘ मुले उड्या मारत स्वयंपाक घरात गेली.. भेळेवर ताव मारायला.

© सुश्री शीला पतकी

सोलापूर 

मो. 8805850279

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ वृद्धाश्रम… लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – सौ. गौरी गाडेकर ☆

सौ. गौरी गाडेकर

? जीवनरंग ?

☆ वृद्धाश्रम… लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – सौ. गौरी गाडेकर

मागच्याच आठवड्यात आईवडिलांच्या लग्नाचा ५१ वा वाढदिवस लेका सूनाने (राज आणि नेहाने) मोठ्या उत्साहात साजरा केला आणि दुसऱ्या दिवशी सून मुलांना घेऊन तिच्या माहेरी गेली.

राजने आई-बाबांना मॉलमध्ये नेले, त्यांच्यासाठी कपडे, बुट, चपला, चष्मा एवढेच काय अगदी टुथ ब्रश आणि कंगवे देखील खरेदी केले. छानशा हॉटेलमध्ये जेवण, त्यानंतर मराठी सिनेमा, संध्याकाळी बागेतील फेरफटका, पाणीपुरी, भेळ, आईस्क्रीम आणि त्यानंतर ते घरी परतले. एकंदरीत दिवस खूपच छान गेला.

राज किती खर्च करतोस आमच्यावर ? न राहवून आई-बाबांनी विचारले.

दोन दिवस आपल्याला पाचगणी, महाबळेश्वरला जायचेय आणि त्यानंतर साताऱ्याला, राजने त्याचा प्लॅन आई-बाबांना सांगितला.

पुढील दोन दिवस राज आणि आई-बाबा पाचगणी, महाबळेश्वरला मनसोक्त भटकले. रात्री न राहवून आईने विचारले, राज आता उद्या साताऱ्याला कशासाठी जायचे ?

आईच्या या प्रश्नाला उत्तर देणे राजने शिताफीने टाळले. उद्या लवकर निघायचे आहे असे म्हणून, राज त्याच्या रूममध्ये गेला.

तितक्यात फोन वाजला. राज त्याचा फोन आई-बाबांच्या रूममध्ये विसरला होता. फोन नेहाचा होता. फोन घेताना आईकडून चुकून फोन स्पीकर मोड मध्ये टाकला गेला.

फोनवरून नेहा विचारत होती राज, ठरल्याप्रमाणे शॉपिंग झाले ? पाचगणी, महाबळेश्वर दर्शन झाले ? आता पुढचा प्लॅन म्हणजे आई-बाबांना उद्या सकाळी साताऱ्याच्या वृद्धाश्रमात नेणे. सकाळी १० वाजेपर्यंत पोहोचायचे आहे, पण त्यांना शेवटपर्यंत कसलीही कल्पना येऊ देऊ नकोस. कीप इट टोटली सिक्रेट. नेहाने फोन ठेवला.

नेहा जे बोलली ते खूपच धक्कादायक आणि अनपेक्षित होते. अचानक असा निर्णय का ? कशासाठी ? आपलं काही चूकलय का ? निर्णय पोटच्या गोळ्याचा, की सुनेचा ? असंख्य, अनुत्तरित प्रश्न !

आबासाहेब म्हणतात, साधारणतः एक महिन्यापूर्वी मी बाहेरून आलो, त्यावेळी राज त्याच्या मित्राबरोबर गप्पा मारत होता. मी आल्याचे पाहून दोघेही बाल्कनीत गेले, आणि हळू आवाजात बोलू लागले. वडिलांना वृद्धाश्रमात ठेवल्यामुळे, घरातील कटकटी कमी झाल्या, आणि शांतता निर्माण झाली, असे राजचा मित्र राजला सांगत होता.

आई म्हणते, मी पण ऐकले ते. अहो, पण राजच्या मित्राचे वडील जागेवरून ऊठूही शकत नव्हते, आणि त्यांचं सर्वच आवरायला लागायचं. घरातल्या सर्वांना त्रास व्हायचा. आपलं तसं नाही ना हो, आपण आपलं सर्व काही करतो, शिवाय तुम्ही मुलांना शिकवता, त्यांना शाळेत पोहोचवता, शाळेतून घरी आणता. मी देखील नेहाला स्वयंपाकात, नी घर कामात शक्य तेवढी मदत करते. का आला असेल आपला कंटाळा त्यांना ?

मागच्या आठवड्यात कांदा कापताना माझे बोट कापले, तेव्हा नेहाने पटकन ड्रेसिंग करून, त्यावर पट्टी बांधली, आणि मला सांगितले, आता तुम्ही आराम करा, अजिबात काम करू नका. खुप प्रेमळ आहे हो नेहा !

आबासाहेब म्हणतात, राज ही खूप प्रेमळ आहे. मी भाजी आणायला त्याच्याबरोबर जातो, तेव्हा राज कधीही मला पिशव्या उचलू देत नाही. रस्ता ओलांडताना माझा हात धरतो तो, खूप काळजी घेतो माझी. मागच्या वर्षी मला थोडा ताप आला, तर रात्रभर उशाशी बसून होता.

आई म्हणते, दोन-तीन आठवड्यांपूर्वी नेहाला तिच्या मैत्रिणीशी बोलताना मी ऐकले. नेहाच्या बहिणीसाठी पुण्यातील स्थळं बघायला सुरुवात करणार आहेत. कदाचित आपल्यामुळे अडचण निर्माण होईल, म्हणून आपली रवानगी वृद्धाश्रमात होत असेल.

आबासाहेब म्हणतात, अगदी तसेच असेल, तर काही दिवस आपण तुझ्या भावाकडे, आणि काही दिवस माझ्या बहिणीकडे जाऊ.

आई म्हणते, वृद्धाश्रमात चांगली व्यवस्था नसते, अस्वच्छता असते, आणि खूप हाल होतात, असं मी ऐकलंय. उद्या सकाळी राजला विनवणी करून काही मार्ग निघतो का ते बघायचे का?

आबासाहेब म्हणतात, नको नको. याचना करून काही प्राप्त करण्यापेक्षा, ते न मिळालेलंच बरे!

चला उशीर होतोय झोपू या, उद्या सकाळी लवकर उठायचे, आणि आपल्याला आपल्या अखेरच्या घरी (वृद्धाश्रमात) जायचे ना. आलिया भोगासी असावे सादर म्हणत, आबा आणि आईंनी मनाशी गाठ बांधली, राज आणि नेहाचा प्लॅन, अर्थात् कटकारस्थान आपल्याला समजला आहे, हे अजिबात दाखवायचे नाही. जे होतेय त्यात समाधान मानायचे.

प्रयत्न करूनही दोघांनाही झोप येत नव्हती. दोघांचा संवाद चालूच असतो.

आई : एक विचारू ?

आबासाहेब – विचार !

आई – वृद्धाश्रमात आपल्याला भेटायला राज कधी येईल का ? निदान नातवाच्या वाढदिवसाला तरी आपल्याला त्यांच्या घरी जाता येईल का ? राहायला नव्हे, फक्त त्यांचा कौतुक सोहळा बघण्यासाठी. आपण तेथे राहायचे नाही, मुक्काम करायचा नाही, अगदी जेवणही नाही करायचे. फक्त आशीर्वाद देऊन परतायचे. राज, नेहा आणि नातवा शिवाय राहण्याचा विचार नाही हो केला जात माझ्याकडून. अजून एक विचारू ?

आबासाहेब – तुझा एक कधीच संपत नाही. विचार, विचार.

आई – निदान आपण गेल्यावर आपल्याला अग्नी द्यायला तरी राज येईल का हो ?

आबासाहेब – येईल, राज नक्की येईल, तो तितका कठोर नाही. शेवटी पीडा कायमची गेली, सुटलो एकदाचा, म्हणून तरी आनंदाने येईल. मी सांगतो ते ऐक. जर मी प्रथम गेलो, आणि राज आला नाही, तर तू मला अग्नी दे, आणि तू प्रथम गेलीस, आणि राज आला नाही, तर मी तुला अग्नी देईन.

आई – जर आपण दोघेही एकाच वेळी गेलो तर ?

आबासाहेबाकडून कोणतेही उत्तर आले नाही, बहुधा त्यांचा डोळा लागला असावा.

साताऱ्याला जाताना, राज छान मूडमध्ये होता, आणि बरंच काही बोलत होता, आई बाबा मात्र गप्प गप्पच ! दुतर्फा दाट झाडी, वळणावळणाचा रस्ता, गार हवा, अगदी प्रसन्न वातावरण. कारमधील रेडिओ गदिमांनी रचलेले, बाबूजींच्या जादुई आवाजातील गीत ऐकवत होता – पराधीन आहे जगती, पुत्र मानवाचा, दोष ना कुणाचा !

वृद्धश्रमाच्या मॅनेजर साहेबांनी राज, आबासाहेब आणि आईचे गुलाबाचे फुल देऊन स्वागत केले. संपूर्ण वृद्धाश्रमाला एक राऊंड मारून, ते सर्व मॅनेजर साहेबांच्या केबिनमध्ये विसावले. हिरवीगार झाडी, भव्य पटांगण, सुसज्ज कॅानफरन्स हॅाल, मिटींग रूम्स, प्रशस्त आणि हवेशीर रहायच्या रूम्स. वृद्धाश्रम खरोखरच सुंदर होता. वार्षिक फी १ लाख प्रत्येकी, समोरच्या बोर्डवर लिहिले होते.

चहा पिता पिता, मॅनेजर साहेब म्हणालेत, सर्व तयारी झाली आहे, चला आपण जाऊया. आई-बाबांनी मन घट्ट केले.

मिटींगरूममध्ये २५-३० लोक जमले होते. राज पुढे झाला आणि म्हणाला, हा वृद्धाश्रम माझ्या आई-बाबांना खूप आवडला. हो ना ? राजने आई-बाबांकडे पाहिले. डोळ्यांतले अश्रू लपवत, आईबाबांनी यांत्रिकपणे मान डोलावली !

राजने आईबाबा दोघांना पुढे बोलावले, आणि त्यांच्या हातून मॅनेजर साहेबांना दोन लाख रुपयांचा चेक दिला. टाळ्यांच्या गजरात आई-बाबांचा हुंदका कुणालाही ऐकू गेला नाही.

मॅनेजर साहेब, निघतो. राज म्हणाला.

राज बेटा, सावकाश जा, सांभाळून गाडी चालव, आणि घरी पोहोचल्यावर फोन कर, आई-बाबा म्हणाले.

हे काय, आईबाबा ? मला एकट्यालाच पाठवता ? राजने विचारले.

म्हणजे, आम्हीही यायचे ? खात्री करून घेण्यासाठी आई-बाबांनी विचारले.

अर्थातच, राज उत्तरला.

आणि ते २ लाख रुपये, वृद्धाश्रमाच्या फी चे ? आईबाबा दोघेही एकाच वेळी एका सुरात म्हणाले.

छे, छे, ते तर तुमच्या लग्नाच्या ५१ व्या वाढदिवसानिमित्त, तुमच्या हस्ते वृद्धाश्रमाला दिलेल्या देणगीचे. चला, आपल्याला परत पुण्याला जायचेय, राजने उत्तर दिले.

आई-बाबांसाठी हा सुखद धक्का होता. परतीचा प्रवास सुरू झाला, आणि तितक्यात नेहाचा फोन आला. राज, कसा झाला कार्यक्रम ? लवकर परत या. मी आणि मुलं तुझी आणि आई-बाबांची वाट पाहत आहोत, आणि हो, येताना, शिरवळला आईंची आवडती भजी, आणि बाबांचा आवडता बटाटेवडा खायला विसरू नका.

नेहाचे फोनवरील बोलणे ऐकल्याने, झालेला गोंधळ मिटला होता. परतीचा प्रवास खूपच सुखकर होता. नातवापासून ताटातूट होणार नव्हती, घर सुटणार नव्हते, सुनेचा नी मुलाचा सहवास लाभणार होता. हरवेल असे वाटणारे सुख अबाधित होते.

कारमधील रेडिओ मस्त गाणं ऐकवत होता – मला सांगा, सुख म्हणजे नक्की काय असतं ? काय पुण्य असलं की ते, घरबसल्या मिळतं !

लेखक : अज्ञात 

प्रस्तुती : सौ. गौरी गाडेकर

संपर्क – 1/602, कैरव, जी. ई. लिंक्स, राम मंदिर रोड, गोरेगाव (पश्चिम), मुंबई 400104.

फोन नं. 9820206306,  ई-मेल- gauri_gadekar@hotmail. com; gaurigadekar589@gmail. com

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ भाग्यवान – सौ. उज्ज्वला केळकर, वेळेचा अभाव – सुश्री अनिता रश्मि, संशोधन – सुश्री अर्चना तिवारी, ममत्व – सुश्री अर्चना तिवारी ☆ मराठी भावानुवाद – सौ. उज्ज्वला केळकर ☆

सौ. उज्ज्वला केळकर

? जीवनरंग ?

☆ भाग्यवान – सौ. उज्ज्वला केळकर, वेळेचा अभाव – सुश्री अनिता रश्मि, संशोधन – सुश्री अर्चना तिवारी, ममत्व – सुश्री अर्चना तिवारी ☆ मराठी भावानुवाद – सौ. उज्ज्वला केळकर

☆ ☆ ☆ ☆

१) भाग्यवान

दादा आणि भाऊ बालमित्र. दोघेही एका शाळेत, एका वर्गात शिकले. पुढे दादासाहेब शाळेत मास्तर झाले आणि नंतर हेडमास्तर. भाऊसाहेब एका कचेरीत कारकून म्हणून लागले. पुढे हेड क्लार्क झाले.

दोघांची लग्ने जवळपास एकदमच काही महिन्यांच्या अंतराने झाली. दादांचा मुलगा आदित्य आणि भाऊंचा मुलगा गौरव हेही समवयस्क. दादांना पुढे अमेय झाला. भाऊंना मुलगी झाली गौरी. ही सारी मुलेही एकाच शाळेत शिकली.

दादांची मुले आदित्य आणि अमेय अतिशय हुशार आणि प्रखर बुद्धीची. सतत नंबरात असलेली. स्कॉलरशिप मिळवणारी. दादांना त्यांचा अभिमानच नव्हे, तर गर्व होता. भाऊंच्या पुढे ते आपल्या मुलांचं वारेमाप कौतुक करत. आपण किती नशीबवान आहोत, हे वारंवार बोलून दाखवत. त्यांना थोडसं हिणवतसुद्धा. भाऊंची मुलेही हुशार होती, पण दादांच्या मुलांप्रमाणे चमकत्या करिअरची नव्हती.

आदित्य पवईहून एम. टेक. झाला. त्याला चांगल्या पगाराची नोकरी लागली. सुंदर, सुविद्य पत्नी मिळाली. पुढे परदेशात मोठे पॅकेज मिळाले. तो अमेरिकेला निघून गेला. अमेयही त्याच्या पाठोपाठ अमेरिकेला गेला. तिथेच स्थिरावला. तिथेच लग्न केले. संसार मांडला.

गौरव डिप्लोमा झाला. नंतर एम. बी. ए. केले. टू व्हीलर दुरुस्तीचा वर्कशॉप सुरू केला. गोड बोलणं, कष्ट करण्याची तयारी यामुळे गौरवचा धंद्यात चांगलाच जम बसला. पुढे त्याने टू व्हीलर गाड्यांची एजन्सी घेतली. त्याचाही संसार मार्गी लागला.

दादा आणि भाऊ आता निवृत्त झाले होते. ते रोज संध्याकाळी भेटत. एकत्र फिरायला जात. वाढत्या वयानुसार रोजची भेट अधून मधून झाली. नंतर नंतर दुर्मिळ होऊ लागली. दोघांच्या तब्बेतीच्या तक्रारी सुरू झाल्या. गौरव आपल्या वडलांची काळजी घेत होता. अधून मधून आपल्या दादा काकांकडे येऊन त्यांचीही विचारपूस करत होता. त्यांना काय हवं- नको ते बघत होता. गरजेच्या गोष्टी आणून देत होता

दादांची मुले अमेरिकेत गेल्यानंतर सुरूवातीला एक-दोनदा येऊन गेली. नंतर नंतर मात्र त्यांना यायला वेळ मिळेनासा झाला. दादांना पेन्शन होती. ते काही आर्थिकदृष्ट्या आपल्या मुलांवर अवलांबून नव्हते.

दादांचे प्रोस्टेटचे ऑपरेशन करायचे ठरले. गौरवने दादांच्या मुलांना कळवले. मुले म्हणाली, ‘पैसे पाठवू का? यायला वेळ नाही. ’ दादांच्या रक्तप्रवाहात ब्लॉकेजेस निघाली. अ‍ॅंजिओप्लास्टी करायचे ठरले. गौरवने दादांच्या मुलांना कळवले. मुले म्हणाली, ‘पैसे पाठवू का? यायला वेळ नाही. ’ दादांना माईल्ड हार्ट अ‍ॅटॅक आला. गौरवने दादांच्या मुलांना कळवले. मुले म्हणाली, ‘पैसे पाठवू का? यायला वेळ नाही. ’ गौरवने दादांचे सारे मुलाच्या मायेने केले.

दादांना आताशी वाटू लागलय, आपली मुलं थोडी कमी हुशार असती तर बरं झालं असतं. भाग्यवान आपण नाही. भाऊ आहे.

लेखिका : सौ. उज्ज्वला केळकर 

☆ ☆ ☆ ☆

(२) वेळेचा अभाव 

फेसबुकवर जशी काही स्पर्धा चालू होती. क्षणांशात एक नवीन पोस्ट त्याने टाकली. त्यात अनेक फोटो सामील होते. रंग बदलणारे ढग, चित्रकार सूर्य, झाडांचे, पर्वतराज हिमालयाचे, मोहवणार्‍या आकर्षक धारणीचे, हसणार्‍या खिदळणार्‍या रत्नाकराचे, सर्पिणीसारख्या नागमोडी वळणाने जाणार्‍या सरितांचे, याचे… त्याचे… आणखी किती तरी…

यावेळी दु:खी-कष्टी झालेल्या सुनीलने आपल्या मृत झालेल्या वडलांचा देह आणि हार घातलेला त्यांचा फोटो अपलोड केला. आसपासच्या आगरबत्यातून, वर वर चढत जाणार्‍या धूम्ररेखा नुकतंच त्यांचं निधन झाल्याची ग्वाही देत होत्या.

सगळ्यात जास्त लाईक्स या फोटोला मिळाले.

एका बहिणीने आपल्या भावाला फोन केला,

‘तू त्यांच्याकडे जाऊन का आला नाहीस? निदान पोस्टवर त्यांच्याविषयी श्रद्धांजलीचे दोन शब्द तरी लिहायचे. सुनीलला सांत्वना मिळाली असती. ’

‘ताई तेवढा वेळ नव्हता. लाईक तर केलं ना?’ आणि तो पुन्हा विविध सुंदर दृश्यांचे फोटो आपलोड करू लागला.

मूळ कथा – समयाभाव

मूळ लेखिका – सुश्री अनिता रश्मि, मो. 9431701893

अनुवाद : सौ. उज्ज्वला केळकर 

☆ ☆ ☆ ☆

(३) संशोधन

‘मुलांनो, मला असं वाटतं, यावेळी शेतकर्‍यांवर संशोधन प्रबंध हाती घ्यावा. ’

‘फारच छान!’

‘मग सगळ्यात आधी नामवंत लेखकांकडून या विषयावरच्या कथा मागवून घ्याव्या. ’

‘ठीक आहे सर, पण याबाबतीत एक गोष्ट मनात येतेय. ’

‘अरे, नि:संकोचपणे सांग. ’

‘सर, शेतकर्‍यांवर संशोधन प्रबंध हाती घेत आहोत, तर त्यावरील कथांची गरज आहे का?’

‘म्हणजे काय? संशोधनासाठी कथेत शेतकरी हे पात्र असायलाच हवं. ’

‘मला म्हणायचय, प्रत्यक्षात शेतकरी काय करतोय, कसा जगतोय, याचं वर्णन यायला नको का?’

‘अजबच आहे तुझं बोलणं! वास्तवातल्या पात्रांवर कधी संशोधन झालय?’

‘पण सर, संशोधनात नवीन गोष्टी यायला हव्यात नं?’

‘ओ! समजलं तुला काय म्हणायचय!’

‘मग काय त्याबद्दल माहिती गोळा करूयात?’

अरे बाबा, आपल्याला, लेखकाच्या लेखणीच्या टोकाच्या परिघात असलेल्या कथांमधील शेतकरी पात्रांवर संशोधन करायचय. त्यांच्याबद्दल वाचल्यानंतर अश्रूंसह दयाभव जागृत व्हायला हवा. शेत सोडून रस्त्यावरून ट्रॅक्टर फिरवणार्‍यांवर आपल्याला संशोधन करायचं नाहीये. ’

‘पण असं तर ते आंदोलन करण्यासाठीच करताहेत नं!’

‘हे बघ, ज्या शेतकर्‍यांबद्दल तू बोलतोयस, त्यातील एक तरी अर्धा उघडा, अस्थिपंजर शरीर असलेला आहे का?’

‘पण सर, आता काळ बदललाय. प्रत्येक जण प्रगती करतोय. ’ 

‘बाबा, एक गोष्ट लक्षात ठेव, संशोधनासाठी शोषित असलेलीच पात्र योग्य ठरतात. अशा पात्रांच्या कथाच काळावर विजय मिळवणार्‍या ठरतात.

मूळ कथा – शोध

मूळ लेखिका – सुश्री अर्चना तिवारी, मो. – 7499103852 

अनुवाद : सौ. उज्ज्वला केळकर 

☆ ☆ ☆ ☆

(४) ममत्व 

सावित्रीच्या मुलीच्या सासरहून फोन आला की पारोला मुलगा झालाय. आजी झाल्याच्या आनंदात तिने आसपास, परिचित नातेवाईक यांच्यामध्ये मिठाई वाटली. काही वेळाने मुलीचा फोन आला, ‘माझ्याकडे यायचं, तर आपला चांगला आब राखून ये. आपली इज्जत आणि प्रतिष्ठा वाढेल, अशी ये. ’ 

पारोचं जेव्हा लग्नं ठरलं, तेव्हा मागणी तिच्या सासरच्यांकडून होती. त्यावेळी तिने आपले दागिने विकून आणि जी काही जमा-शिल्लक होती, ती काढून, मोठ्या थाटा-माटात तिचं लग्नं लावून दिलं होतं.

यावेळी मागणी तिच्या स्वत:च्या मुलीची होती. खरं तर पारोला आपल्या आईच्या परिस्थितीची चांगली जाणीव होती. सावित्रीने आपल्या दोन्ही मुलांना पारोच्या फोनबद्दल सांगितलं. पण दोघांनीही आपण स्वत:च पैशाच्या तंगीत आहोत, असं म्हणत हात झटकले. सावित्रीने मग आपल्या राहिलेल्या दोन सोन्याच्या बांगड्या विकल्या. आपल्या नातवाला सोन्याची चेन केली. मुलीच्या सगळ्या परिवारासाठी कापड-चोपड घेतलं. फळांच्या आणि, मिठाईच्या टोपल्या घेतल्या आणि ती पारोकडे आली. पारोच्या सासरी तिची इज्जत वाचली पण ती जेव्हा घरी आली, तेव्हा तिच्यावर दु:खाचा पहाड कोसळला.

सावित्रीने आपल्या बांगड्या विकल्याचे ऐकून तिची मुलं आणि सुना अशा संतापल्या की वाद-विवाद, भांडणात ती दोन घास अन्नालाही महाग झाली. आता सावित्री मंदिरात सेवा करून आपला जेवणाचा आणि औषधापाण्याचा खर्च चालवते आणि तिथल्या धर्मशाळेच्या तुटक्या-फुटक्या खोलीत खंत करत आपलं म्हातारपणाचं ओझं वहाते.

इकडे मुलं आणि सुना सांगत फिरतात की आईला देवाची इतकी ओढ लागली आहे, आता ती घराच्या बंधनात बांधून राहू इच्छित नाही. ती आता संन्यासिनी झालीय. आता ती घरीदेखील येत नाही.

मूळ कथा – ममत्व

मूळ लेखक – अशोक दर्द

मो. 9418248262 

अनुवाद – सौ. उज्ज्वला केळकर

मराठी भावानुवाद : सौ. उज्ज्वला केळकर 

संपर्क – निलगिरी, सी-५ , बिल्डिंग नं २९, ०-३  सेक्टर – ५, सी. बी. डी. –  नवी मुंबई , पिन – ४००६१४ महाराष्ट्र

मो. 836 925 2454, email-id – kelkar1234@gmail.com 

≈संपादक –  श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares