मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ माझी जडणघडण… भाग – – ७७ / २ – ☆ सौ राधिका भांडारकर ☆

सौ राधिका भांडारकर

??

☆ माझी जडणघडण… भाग – – ७७ / २ – ☆ सौ राधिका भांडारकर ☆

(सौजन्य : न्यूज स्टोरी टुडे, संपर्क : ९८६९४८४८००)

ग्रँड कॅन्यन.

(साधारण एक तासाची ही भूगर्भीय सफर होती. आम्हाला दुपारी सव्वा बाराची वेळ मिळाली. इथेही वेळेत एक तासाचा फरक आहे. एक तासाने हा परिसर मागे आहे.

आम्ही तिथल्या गिफ्ट शॉपमध्ये काही खरेदी करण्यात वेळ घालवला) 

इथून पुढे — 

ही सफर अवघड, साहसी असणार याची कल्पना होतीच. संपूर्ण पायी सफर होती. आमच्याबरोबर टुर गाईड होता. आम्हाला सफरपूर्वी अनेक सूचना दिल्या गेल्या. कुठल्याही सॅक्स, काठी कॅमेरा बरोबर नेता येणार नव्हत्या. मोबाईलला परवानगी होती.

आमचा दहा बारा जणांचा गृप होता. काही वृद्ध ही होते.

अमेरिकन, जपानी चायनीज सारेच होते. मी सर्वात ज्येष्ठ असेन. पण ही सारी मंडळी अतिशय सहकार्य देणारी होती.

सर्वांच्या मनांत एकच स्वप्न होतं, या जमीनीच्या पोटात दडलंय् तरी काय? हे बघण्याचं..

अक्षरश: आम्ही धरतीच्या उदरात चाललो होतो. अतिशय 

सरळ अशा शिड्या होत्या. सांभाळून उतरावे लागत होते.

असे सहा टप्पे आम्ही उतरलो. सातवा फारच कठिण होता. भूमिकन्या सीतेची मला आठवण झाली. धरतीने तिला जसे कुशीत घेतले तसे ती आम्हालाही घेत होती.

आता आम्ही प्रत्यक्ष कॅन्यनजवळ पोहचलो. आणि जे नजरेला दिसलं ते या दोन डोळ्यात मावणारं नव्हतंच. अरुंद, चढउताराची, वालुकामय अशी पायवाट तुडवत आम्ही त्या भूगर्भातल्या खिंडीत चालत होतो.

कुंभाराने बनवलेल्या मडक्यासारखं ते अनंत आकार घेउन 

पसरलेलं होतं. धरतीच्या वर एका बाजूला या कॅन्यनचं

उघडं द्वार होतं. तितपर्यंत आम्हाला जायचं होतं. बाहेर येण्याचा रस्ता फक्त तोच होता. आता no come back.

चालायचे. वळसे घेत. बघत बघत. वरुन सूर्यकिरण पाझरत होते. छाया प्रकाशाचा अत्यंत मनोरम खेळ आम्ही पहात होतो. त्या दगडांमध्ये शार्क, ईमो, सी हाॅर्सचे आकार दिसत होते. एक लेडी विथ द विंड नावाचंही शिल्प तयार झालं होतं. तिचा चेहरा आणि तिचे उडणारे केस. हे सगळं आमच्या नजरेसमोर आमचा टूर गाईड आणण्यास मदत करत होता. आणि मग “अय्या! खरंच” “ओह माय गॉड” सारखे ऊद्गार उत्स्फूर्तपणे बाहेर पडत होते. ज्या वाटेने आम्ही चाललो होतो त्या वाटेवरुन पावसाळ्यात पाण्याचा प्रचंड लोट वाहतो. सगळी वाळू वाहून जाते. तेव्हां ही सफर बंद ठेवावी लागते. इथे मन्सुन एप्रील ते जुनपर्यंत असतो आणि तसंही पावसाचा नेम नसतोच. आमचे भाग्य म्हणून आम्हाला हे पहायला मिळाले. आतमध्ये चालत असताना मधून मधून आम्हाला वाळुतला ओलसरपणा जाणवतही होता.

जवळ जवळ एक दीड तासाने आम्ही धरतीच्या उदरातून बाहेर आलो. सूर्यप्रकाशात आलो. आता आम्ही जमिनीवर होतो. डोक्यावर रणरणतं ऊन होतं. पण हवेत सुखद गारवा होता.

जे पाहिलं, अनुभवलंं ते वर्णनातीत होतं.

निसर्गासमोर माणूस म्हणून जगताना मी फक्त एक कण आहे असेच वाटले.

मनोमन त्या किमयागाराला मनापासून वंदन केले.

 

आज आमच्या ग्रँड कॅन्यन टूरचा शेवटचा टप्पा होता.

आज आमाही सेडोना या जवळच्याच नगरीला भेट द्यायचे ठरवले.

फ्लॅगस्टाफ ते सेडोना हा एकतासाचा ड्राईव्ह आहे. म्हणजे साधारण आमच्या हाॅटेलपासून वीस मैलाचा प्रवास.

अॅरीझोना स्टेट म्हणजे जगातले एक नंबरचे वाळवंट.

रुक्ष, रेताड, रखरखीत. मात्र सेडोना हे येथील अतिशय नयनरम्य, निसर्गरम्य असे हिल स्टेशन आहे.

ड्राईव्ह अतिशय रमणीय होता. घाटातला, वळणा वळणाचा रस्ता. दुतर्फा उंच सुचीपर्णी (पाईन)चे उंच वृक्ष. आणि पलीकडे अजस्त्र कॅन्यन. अॅरीझोना म्हणजे पर्वतीय, भूगर्भीय आश्चर्यच.. आतापर्यंतच्या संपूर्ण प्रवासात आम्ही पर्वत राशीवर वारा, पाणी आणि खचणार्‍या मातीमुळे तयार झालेली ही नैसर्गिक विवीध आकारांची लाल पांढरी कधी पिवळी अशी असंख्य शिल्पे पाहिली. आणि प्रत्येक वेळी मंत्रमुग्ध झालो. आजच्या प्रवासातही आम्ही अनेक वेळा न राहवून थांबलो. फोटो काढले. आणि निसर्गोत्सवाचा आनंद ऊपभोगला. इथेच आम्ही नवरात्री देवीची असंख्य रुपेच पाहिली जणू…

सेडोना येथील अमिताभा स्तुप आणि शांती वनाला आम्ही भेट दिली. जवळ जवळ १४एकर मध्ये वसलेलं आणि उंच उंच लाल खडकांनी वेढलेलं थंडर माउन्टनच्या पायथ्याशी असलेलं. मनाला अगाध शांती देणारं हे स्थान आहे. जेट्सुमा या न्यूयाॅर्कर लामाने ही जागा स्तुपासाठी निवडली. तिबेटीयन पद्धतीचा हा स्तुप आहे.

इथे सर्वधर्मीय लोक ध्यान धारणा (meditation) आणि प्रार्थने साठी येतात. नतमस्तक होतात.

अखंड महागनी लाकडात कोरलेली बुद्धाची मूर्ती इथे एका खडकावर स्थित आहे. ही मूर्ती इंडोनेशीयाहून या स्तुपास भेट म्हणून दिली गेली आहे. आणि जवळ जवळ ३६ फूट उंच अशी ही सुंदर मूर्ती आहे.

त्या ठिकाणी पोहचल्यावर खरोखरच माणूस हळुहळु तणावमुक्त होतो. तिथल्या वातावरणात अशी काही उर्जा आहे की सार्‍या चिंता, विकार झाडावरच्या पानाप्रमाणे गळून पडतात. इश्वर एक आहे, चराचरात त्याचं वास्तव्य आहे हे जाणवतं. माझ्या मनाने जो गारवा इथे अनुभवला तो शब्दातीत आहे. खरोखरच इथे मला तो भेटला. त्याच्या चरणी मी लीन झाले. एक अद्वैताचीच अनुभूती मला मिळाली…

सेडोना येथील चॅपल आॉफ होली क्राॉसला आम्ही भेट दिली. हे दुसरं भक्तीमय वातावरणाचं स्थान. अत्यंत शिस्तबद्ध आणि शांत.

हे चॅपल कोकोनिनो नॅशनल फाॅरेस्ट लँडवर, उंच अशा टेकडीवर अतिशय सुबक पद्धतीने बांधलेले आहे. हे बांधण्यास केवळ अठरा महिने लागले. १९५६साली या चॅपलचे बांधकाम पूर्ण झाले. जवळजवळ ३००, ३०० यु एस डाॅलर्स या बांधकामासाठी लागले.

उंच गाभार्‍यात धातुची येशुची क्रुसावरची मूर्ती आहे.

भिंतींवर, येशूला ज्या खिळ्यांनी क्रुसावर ठोकले त्यांची प्रतिकात्मक म्युरल्स आहेत. शांत मेणबत्यांच्या प्रकाशात त्या मूर्तीकडे पाहताना नकळतच आपल्या कानात शब्द ओतले जातात, ” हे! प्रभु! यांना क्षमा कर. कारण त्यांना कळत नाही ते काय करत आहेत..! “

मन अंतर्मुख होते.

समोरच्या ऊंच लाल खडकात हातात लहानग्या येशुला घेतलेली मदर मेरी दिसते. प्रार्थनेसाठी उंचावलेले भक्तीमय करांचे दर्शन होते…

सारेच अलौकिक. कल्पनेच्या पलीकडचं. सूक्ष्मतेतून विशालतेकडे नेणारं.. द्वैतातून अद्वैताकडे जाणारं..

परमात्म्याची वाट दाखवणारं.

 

सेडोना मधल्या लाकीपाकी या आर्ट्स आणि क्राफ्ट विलेजला आम्ही भेट दिली. हे एक कलाकार आणि त्यांची कलाकारी प्रस्तुत करणारं, ओक क्रीकच्या किनारी वसलेलं असं देखणं गाव. सुंदर पायवाटा, कारंजी, विवीध रंगांची फुलझाडे, कलात्मक रितीने रंगवलेल्या भिंती पाहताना खूपच मजा वाटत होती. इथे पन्नास पेक्षा अधिक दुकाने आहेत. विवीध कलात्मक वस्तुंचे सुंदर प्रदर्शनच म्हणा ना.

अनेक क्युझीनची रेस्टारंट्स इथे आहेत. आम्ही एका मेक्सीकन रेस्टाॅरंट मध्ये दुपारचे जेवण घेतले…

किती पाहशील तू.. किती घेशील तू अशीच आमची स्थिती झाली. पाय दुखत होते. मन भरत नव्हतं. खिसाही रिकामा होत होता.. अखेर नाईलाजानेच बाहेर पडलो त्या सौंदर्य नगरीतून..

 

आमच्या या ग्रँड कॅन्यन सफरीतला अत्यंत आकर्षक आणि एक्सायटींग कार्यक्रम म्हणजे फ्लॅगस्टाफ शहरातील वेधशाळेची (observatory) भेट.

फ्लॅगस्टाफ हे खगोल शास्त्रज्ञांचे प्राचीन संशोधन पीठ आहे. १८९४ मध्ये ही लाॅवेल वेधशाळा स्थापीत झाली.

१९१२ साली ब्रह्मांडात होणारे बदल आणि विस्तार यांचा विस्तृत अभ्यास, संशोधकांनी या वेधशाळेत केला.

 १९३० साली इथे प्लुटो या ग्रहाचा शोध लागला.

सूर्यमाला, ग्रह तारे, आकाशगंगा, आणि अंतराळ या विषयीचे संशोधन इथे सातत्याने होत असते.

तीन ते चार मीटर उंच असलेले LDT आणि DCT हे जगातील अत्यंत कार्यक्षम असे टेलीस्कोप इथे आहेत.

जगातील सर्व खगोलप्रेमी लोक इथे भेट देउन ग्रहतार्‍यांच्या राज्यातला आनंद भोगतात. आज आम्हीही त्यापैकी एक होतो हे अहोभाग्यम्.!! लहानपणी माझे वडील आम्हाला पहाटे किंवा रात्री खुल्या मैदानावर केवळ तारे पहायला घेऊन जात. आज जगप्रसिद्ध टेलीस्कोपमधून हे ब्रह्मांडपाहताना कोण आनंद होत होता हे कसे सांगू?

रिंग असलेला तो डौलदार शनी आणि त्याचे ८२ चंद्र तसेच केवळ वायुरुपी भला मोठा गुरु हा ग्रह आणि चार चंद्र इतक्या जवळून डोळ्यात साठवताना देवाने दृष्टी दिल्याचे सार्थक झाल्यासारखे वाटले….

 

बघावं तितकं थोडं.. लिहावं तितकं थोडं..

तर अशीही अमेरिकेतल्या अॅरोझोना राज्यातील आमची मनमौजी सफर साठा उत्तरी सफल संपूर्ण झाली.

*अद्भुत* या शब्दांचा खरा अर्थच या सफरीत मी अनुभवला असे म्हणायला हरकत नाही.

– भाग ७७ समाप्त.

© सौ. राधिका भांडारकर

पुणे

मो.९४२१५२३६६९

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ माझी जडणघडण… भाग – – ७७ / १ – ग्रँड कॅन्यन ☆ सौ राधिका भांडारकर ☆

सौ राधिका भांडारकर

??

☆ माझी जडणघडण… – भाग – ७७ / १ – ग्रँड कॅन्यन ☆ सौ राधिका भांडारकर ☆

(सौजन्य : न्यूज स्टोरी टुडे, संपर्क : ९८६९४८४८००)

ग्रँड कॅन्यन.

असं म्हणतात की तुम्ही अगदी जाज्वल्यपणे एखादं स्वप्न बाळगलं असेल तर कधीतरी ते प्रत्यक्षात साकार होतंच.

अॅरीझोना स्टेट अमेरिका येथील ग्रँड कॅन्यन कधीतरी पहायला मिळावंं हे माझं अगदी शाळेत असतानापासूनचे स्वप्न होते. आणि ते अगदी अलीकडेच म्हणजे २०२२ साली माझी अमेरिकास्थित लेक ज्योतिका हिच्यामुळे प्रत्यक्षात अवतरले.

आतापर्यंतच्या भ्रमंतीतली ही वेगळाच अनुभव देणारी, निसर्गाचा निराळाच अविष्कार दाखवणारी अविस्मरणीय सफर होती. माझी नात सायरा, ज्योतिका, मी आणि विलास अटलांटाहून अमेरिकन एक्सप्रेसच्या विमानाने अॅरिझोना स्टेट मध्ये फ्लॅगस्टाफ या गावात आलो. आमच्या प्रवासात डॅलसला चार तासाचा हाॅल्ट होता.

 

ग्रँड कॅन्यनला जाण्यासाठीचे हे पर्यटन स्थळ आहे.

इथल्या स्थानिक वेळेनुसार आम्ही रात्री साडे नऊला पोहचलो. ज्योतिकाने कार रेन्ट केली. सुंदर, मोठी ऐसपैस कार.

डलासला आम्ही डिनर घेतलेच होते. एग रोल्स, फ्राईड राईस, चिकन नुडल्स वगैरे.

फ्लॅगस्टाफला हाॅलीडे इन मध्ये बुकींग होतेच.

छान आरामदायी हाॉटेल.

लगेच झोपेच्या अधीनच झालो. प्रवासाने थकवा आलाच होता. अटलांटा आणि अॅरीझोनाच्या वेळेत तीन तासाचा फरक आहे.

दुसर्‍या दिवशी सकाळी लवकरच जाग आली. ज्योतिकाने दिवसभराची भटकंती योग्य पद्धतीने आखलेली होतीच.

ब्रेकफास्ट घेउन आम्ही लगेच निघालो. ज्युस, दही सीरीअल्स, आॅम्लेट वगैरे अमेरिकन ब्रेकफास्ट होता.

आजचे ध्येय होते *हाॉर्स शू बेन्ड हिल्स.. *

ड्राईव्ह अतिशय सुंदर होता. अॅरीझोना म्हणजे जगातील सर्वांत मोठे वाळवंट. रस्त्याच्या दोन्ही बाजूला पसरलेला विस्तीर्ण ओसाड प्रदेश. मध्ये मध्ये दिसणारी खुरटी पण हिरवट झुडुपे. गडद पिवळ्या रंगाची रानफुले. लालसर रंगाचे गवत. लांबच लांब पसरलेले पर्वत. अगदी निरभ्र निळे अथांग आकाश. निसर्गाचं एक अत्यंत निराळं पण देखणं रुप पाहून विस्मयीत झालो. भारतातले कच्छचे रणही आठवले. वाटेत अनेक नैसर्गिक सँड ड्युन्स दिसले. अगदी रचून ठेवलेल्या वाळूच्या ढिगार्‍यासारखे दिसत होते. आता आम्ही संपूर्ण डोंगरांच्या विळख्यातच होतो जणू जिथे पहाल तिथे हे लाल रंगांचे दगडी कॅन्यन. या डोंगरांमध्ये निसर्गानेच अनंत आकाराची शिल्पेच बनवली आहेत जणू! इतकी रेखीव आणि आकृतीबंध! बघणार्‍याच्या नजरेने त्या शिल्पांना कुठलीही नावे द्यावीत. महाल, मंदीरे, कळस, मखर, गाभारे नृत्यांगना, राजे, प्राणी, काहीही. अतिशय रेखीव आणि कोरीव. आणि हे सारंं नैसर्गिक. मानवनिर्मीत शिल्पकला आतापर्यंत ठिकठिकाणी पाहिल्या. पण इथे एकमेव शिल्पकार, केवळ निसर्ग. आम्ही रस्त्यात थांबत, फोटो काढत या निसर्गाच्या अप्रूपतेच्या आठवणी साठवत होतो.

हाॅर्सशूबेन्ड हाही एक नैसर्गिक चमत्कारच आहे. एका उंच डोंगराभोवती घोड्याच्या नालेसारखी कोलॅरॅडो नदी वळसा घेत वाहते. आम्ही व्ह्यु पाॉईंट वरुन हे मनोहर दृष्य डोळ्यात साचवले. हिरवीगार संथ नदी. जणू इतस्तत:विखुरलेल्या डोंगरांची सखीच.

 

व्ह्युपाॅइंटपर्यंत बरेच चालावे लागले होते. रणरणतं उनही होतं. मात्र हवेत सुखद गारवा होता. वार्‍याच्या झुळकी आनंददायी होत्या. प्रदूषणरहित वातावरण. आणि डोक्यावरचे नितांत निळे आकाश. त्यामुळे उन्हातले चालणे सुद्धा अजिबात कष्टदायी नव्हते.

 

मी सहज म्हटलं, भारतात अशा ठिकाणी खाद्य पेयांच्या टपर्‍या असतात. इथे तसे काहीच नाही.

माझी नात लगेच म्हणाली”, here they dont want to ruin the nature–”

किती खरे आहे हे!!

इथे फक्त निसर्गाच्या सहवासात रहा. आनंद जपा, आनंद वेचा.

 

*ग्रँड कॅन्यन रेलरोडटुर* तर्फे केलेला आमच्या प्रवासाचा पुढचा टप्पाही एक वेगळाच अनुभव देणारा होता. सकाळी आठ वाजता आमच्या हाॅटेलवर ट्रॅव्हल्सची व्हॅन घ्यायला आली.

व्हॅन एकदम आरामदायी होती. आम्ही दहा प्रवासी होतो.

निरनिराळ्या देशातील लोक होते ते. आमचा ड्रायव्हर एकदम हसतमुख आणि भरपूर बोलका होता. संपूर्ण प्रवासात तो अनेक किस्से, भौगोलिक माहिती आम्हाला पुरवत होता.

गेट टू ग्रँड कॅन्यन या रेल्वेस्टेशनवर आम्ही एका ट्रेनमध्ये बसलो. हा ट्रेनचा प्रवास अतिशय सुंदर होता. गाडीत सर्व सुखसोयी आणि स्वच्छता होती. मधून मधून प्रवाश्यांची खबरबात घेणारा मदतनीसही होता. तो अॅरीझोना स्टेटचा इतिहासही सांगायचा. फोटोग्राफर होती. गिटारवादक होता. त्याने सुरेल संगीताने प्रवाशांचे मनोरंजन केले. पाईन ट्रीच्या जंगलातला हा आगगाडीचा संथ प्रवास अगदी अविस्मरणीय होता.

आम्ही ग्रँड कॅन्यन स्टेशनला पोहचलो. दोन तासाचा हा आगगाडीचा प्रवास कसा संपला ते कळलेच नाही.

इथे आमची व्हॅन व ड्रायव्हर हजरच होते.

प्रथम लंच घेतले. आणि नंतर प्रत्यक्ष ग्रॅड कॅन्यन ची सफर सुरु झाली. अतिशय सुंदर, रेखीव आखीव गाव. इथे रहाण्यासाठी बैठे बंगले असतात. पण त्यासाठी तीन वर्षे आधी बुकींग करावे लागते.

पहिल्या व्ह्यु पाॅईंटला आम्ही उतरलो आणि निसर्गाच्या त्या विस्तीर्ण, भव्यतेच्या दर्शनाने नि:शब्द झालो. अमेरिकेतल्या सात आश्चर्यांपैकी ग्रँड कॅन्यन हे एक नैसर्गिक भूगर्भीय आश्चर्य!

कॅन्यन म्हणजे दरी. खिंड. आणि या दरीतली पर्वतासमान भासणारी अनेक आकारांची नैसर्गिक शिल्पे.

कोलोरॅडो नदीचा प्रवाह इथे पहायला मिळतो. जमीनीतून वर झेपावणारे असंख्य खडक या नदीच्या पाण्याच्या दाबाने कातरत गेले. शिवाय वाराही या खडकांना सतत कापत असतो आणि त्यातून ही असंख्य शिल्पे तयार झाली आहेत. आणि मैलौन् मैल ती पसरलेली आहेत. बघणार्‍याच्या नजरेला जो दिसेल तो आकार. इथे राजवाडे, मंदीर दालने, गड किल्ले, गाभारे, माणसे प्राणी पक्षी अगदी गणपती, नंदीबैल, गरूड पक्ष्यांसारखे आकार इथे पहायला मिळतात. एक अॉस्ट्रेलिअन माझ्या जवळ आला, आणि म्हणाला, ”see over there, an indian temple of God Mahadeo” क्षणभर मलाही ते तसेच वाटले. आणि जगभरात भारतीयांचं इशप्रेम किती प्रसिद्ध आहे हे जाणवले.

 निसर्ग हाच किमयागार.

आम्ही इथे डक अॉन द राॅक या पाॅइंटवर उतरलो.

अक्षरश: एक धारधार चोचीचं बदक पंख आत गोळा करुन एका प्रचंड दगडावर बसलंय् आसाच भास होतो.

१९५० साली आयसेन हॉवरने या ठिकाणी भेट दिली होती.

त्यावेळी ते एक सामान्य नागरिक होते. त्यानंतर ते अमेरिकेचे प्रेसीडेंट बनले.

अर्थात हे सर्व आकार वारा वादळ पाण्यांनी बदलू शकतात.

शंभर वर्षानंतर इथे कदाचित हे आकार नसतील. ते बदललेले असतील.

ब्रह्मानंदी टाळी लागणे म्हणजे काय याचा अनुभवच इथे जणू घेता आला.

एक घारीसारखा पक्षी आकाशात विहरत होता. क्षणभर मला वाटले यांच्या पंखावर बसावे आणि या भव्य दरीतली

ही निसर्गाची किमया न्याहळावी.

स्वर्ग म्हणजे आणखी वेगळे काय असेल.??

थोडे पुढे गेल्यावर वॉच टाॅवर पाॉईंटला कोलोरॅडो नदीचा प्रवाह पहायला मिळाला. याठिकाणी मात्र तिचा प्रवाह 

मलीन वाटला.

 

नोव्होवा नावाची एक इंडीअन जमात इथे आहे. त्यांनी त्यांचं हेरीटेज जपलेलं आहे. बदलत्या जगाचा भाग त्यांना 

व्हायचे नाही. अॅरीझोनाचा काही भाग हा त्यांचं स्वतंत्र राष्ट्र म्हणून मानला जातो. तिथे अमेरिकन फेडरल रुल नसून

नोहोव्हा जमातीचे रुल्स आहेत. त्यांचा अध्यक्षही निराळा आहे. आम्ही ग्रँड कॅन्यनहून परतताना नोवोव्हा रीझोल्युशनला भेट दिली. तिथे मास्क घालणे सक्तीचे होते.

त्यांचे आर्ट आणि क्राफ्ट चे दुकान सुंदर होते. तिथे त्यांची

जीवनपद्धती दाखविणार्‍या कलाकृती पहायला मिळाल्या.

त्यांच्या जीवनाचे एकच ध्येय या पृथ्वीचे रक्षण. निसर्गाला 

मूळ स्वरुपातच सांभाळणे.

मनात आले, खरोखरच आज काळाची ही गरज आहे…

 

याच सफरीतले आणखी एक वैशिष्ट्यपूर्ण ठिकाण म्हणजे. *lower Antelope canyon. *

आम्ही अँन्टीलोप कॅन्यन व्हीजीटींग सेंटरपर्यंत फ्लॅगस्टाफहून कारने आलो. जवळ जवळ अडीच तासाचा ड्राईव्ह होता. ही जागा नोवाहा कम्युनिटीच्या राज्यात येते.

इथूनच प्रत्यक्ष टूरला सुरवात होते. ज्योतिकाने आधीच टुर बुक केली होती. सेंटरवर तिने तिचे बुकींग दाखवले.

आमचे तिघांचे बुकींग होते. मात्र जी सेंटरवरची मदतनीस होती ती म्हणाली, । इथे दोघांचच बुकींग दिसतय्”. सायराचे नावच नव्हते. ज्योतिकाला इंटरनेट मिळत नव्हते. त्यामुळे 

तिला कंपनीशी संपर्क साधता येत नव्हता. शेवटी तिने सायराचे तिथल्या काउंटरवरच परत तिकीट काढले. आॅनलाईनपेक्षा इथले तिकीट थोडे कमीही होते. टेक्नोलाॉजीचे जसे फायदे तसे तोटेही…असो!

साधारण एक तासाची ही भूगर्भीय सफर होती. आम्हाला दुपारी सव्वा बाराची वेळ मिळाली. इथेही वेळेत एक तासाचा फरक आहे. एक तासाने हा परिसर मागे आहे.

आम्ही तिथल्या गिफ्ट शॉपमध्ये काही खरेदी करण्यात वेळ घालवला.

– क्रमशः भाग ७७ / १ 

© सौ. राधिका भांडारकर

पुणे

मो.९४२१५२३६६९

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ व्हॅलेंटाईन डे ☆ सौ. अर्चना सुरेश देशपांडे ☆

सौ. अर्चना देशपांडे

 ☆ मनमंजुषेतून ☆

☆ व्हॅलेंटाईन डे ☆ सौ. अर्चना सुरेश देशपांडे ☆ 

१४ फेब्रुवारी हा जगभर “व्हॅलेंटाईन डे “म्हणून साजरा केला जातो. या दिवशी लोक आपल्या प्रिय व्यक्तीला भेटवस्तू देऊन प्रेम व्यक्त करतात.

पण प्रेम व्यक्त करण्यासाठी एखाद्या दिवसाची गरज काय? . त्यासाठी वेगवेगळ्या कल्पना केल्या जातात, वेगवेगळे कार्यक्रम आखले जातात. , प्रेम व्यक्त केले जाते. रोमान्स ताजा ठेवण्यासाठी जीवाचा आटापिटा केला जातो. सगळेजण करतात म्हणून आपण हा दिवस साजरा करण्याचा प्रयत्न करतो. सर्वजण लॉन्ग ड्राईव्हला जातात म्हणून आपण जातो, कॅन्डल लाईट डिनर करतो, निष्कारण इतरांचेअनुकरण करतो. काहीतरी गिफ्ट द्यायचे म्हणून खिशाला परवडत नाही तरी एखादी वस्तू खरेदी करतो. कमीत कमी एखादं ग्रीटिंग उधार उसनवारीने आणतो आणि पैसे परत करावे लागणार म्हणून दुःखी होतो. ५रुपयाला मिळणार फूल २५रू. खरेदी करतो पण ह्या सगळ्याची खरंच गरज आहे का? कशासाठी पाश्चात्त्यांचे अनुकरण करायचे? ज्याच्यावर किंवा जिच्यावर प्रेम आहे ते पैशातच व्यक्त केले पाहिजे असे कुणी सांगितलंय.

“प्यार करने के लिये पैसा नहीं लगता.. और प्यार में कोई सही, गलत मी नहीं होता.. प्यार सिर्फ प्यार होता है”या उक्तीप्रमाणे त्याला किंवा तिला जे आवडते ते केले तर आनंद द्विगुणित होईल. एखादा मित्र अनेक वर्षे भेटला नसेल तर त्याची भेट घडवून आणता येईल, आवडीचा पदार्थ पोटभर खाऊ घालता येईल. आपल्या मनातील भावना कागदावर लिहून देता येईल ज्यामुळे त्याला किंवा तिला आनंद मिळेल. एखादया भांडण झालेल्या मित्र -मैत्रिणींशी पुन्हा समेट घडवता येईल. मागील वादाबद्दल सॉरी म्हणून दिलगिरी व्यक्त करता येईल. आपल्या मध्ये असणारी एखादी वाईट सवय कायम सोडतोअसा वादा करता येईल त्यामुळेत्याचे किंवा तिचे जीवन बदलून जाईल. हीच खरी प्रेमाची कसोटी ठरली आणि हेच गिफ्ट आयुष्यभर पुरेल. या गोष्टी केल्या तर खऱ्या अर्थाने व्हॅलेंटाईन डे साजरा केला जाईल असे मला वाटते.

© सौ अर्चना देशपांडे 

पुणे

मो.नं‌‌ ९९६०२१९८३६

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ “हॅप्पी व्हॅलेंटाईन…” ☆ सुश्री नीता चंद्रकांत कुलकर्णी ☆

सुश्री नीता कुलकर्णी

? मनमंजुषेतून ?

☆ “हॅप्पी व्हॅलेंटाईन…” ☆ सुश्री नीता चंद्रकांत कुलकर्णी

आजी फिरायला निघाली.

दोन जिने उतरून आजोबा खाली आले…

“अग जरा थांब”

” का… काय झालं? “

” अगं स्वेटर घालायला विसरलीस… उद्या आजारी पडलीस तर मलाच पाय दाबून द्यावे लागतील… “

” ईश्य… अहो काय हे… चार चौघात काय बोलताय”…

मैत्रिणींबरोबर थोडी लाजत हसत आजी गेली.

दोन्ही लेकी लग्न होऊन सासरी गेलेल्या… त्यामुळे आजोबा आजी दोघेच घरात.. पण मजेत दिवस घालवत असतात.

 

“आज दमलेली दिसतेस.. पोळ्या आणू का बाहेरून..? “

“नको आज मेथीची भाजी, भाकरी आणि दाल फ्राय करणार आहे.. “

” फक्कड मेन्यू… कर कर… “

 

त्या दिवशी संध्याकाळी आजोबा सारखा फोन हातात घेत होते.

” अहो सारख काय बघताय? कोणाचा फोन येणार आहे का? “

” हो पल्लवीचा”

“कोण पल्लवी… “

” अगं गोव्याला आमच्याबरोबर ट्रेनिंगला होती… “

तेवढ्यात वाजलाच…

” हो हो निघतो.. पोचतो वेळेत”

अस म्हणून आजोबा गडबडीत गेले..

तरीच आज टी शर्ट घातलाय.. नवीन जॅकेट घातलय… पण या आधी कधी पल्लवी चा उल्लेख केलेला नाही डोक्यात किडा वळवळलाच

सत्तरीतही…

खुशीत आजोबा घरी..

 आजीला कुठले चैन पडायला आजोबा पाय धुवायला गेल्यावर आधी कुणाचा फोन आला होता हे चेक केलं…

आजीला हसूच यायला लागले..

अमोल पिल्ले… ही पल्लवी का…

मनाशी म्हणाली,

घरी आल्यावर माझी कशी गंमत केली हे सांगून माझी मस्करी करणार होता का? मी पण काही कमी नाही… हे आता दाखवतेच…

 

“अहो किती उशीर केलात.. आत्ताच अरू गेला… “

” कोण अरू…? “

” अहो माझी मैत्रीण अरुणा आत्ताच गेली. आमंत्रण द्यायला आले होते दोघे.. “

” पण आत्ता तू अरू गेला अस म्हणालीस.. “

” कोण मी..? “

आजोबांचा चेहरा बघण्यासारखा…

” अहो… उद्या कानाच्या डॉक्टरांकडे जाऊच या.. हल्ली तुम्हाला नीट ऐकू येत नाही बाई. मी बोलते एक तुम्ही दुसरच ऐकता… “

“अग खरचं आत्ता मला स्पष्ट ऐकू आलं.. तू अरुच म्हणाली होतीस”

 

आजीनी फोनचा नंबर फिरवल्याची एक्टिंग करायला सुरुवात केली होती. अशी झक्कापक्की चालु असते दोघांची…

खरं सांगू का…

आयुष्यभर दोघांनी हसत खेळत आयुष्य जगायचं…

मन जुळली की हे असले दिवस साजरे करावेच लागत नाहीत…

तीनशे पासष्ट दिवसातला एक दिवस असतो का हो व्हॅलेंटाईन…

सकाळी हातात दिलेला गुलाब संध्याकाळी कचऱ्यात जातो…

त्यापेक्षा एकमेकांचे हात हातात घेऊन आयुष्यभर आनंदात राहाव… सुखदुःखात एकमेकांना साथ द्यावी..

दोन माणसं म्हंटली की मतं

वेगवेगळी असणारच… इकडे तिकडे जरा होणारच. ज्याला जमेल त्यानी चार पावलं मागे यायचं… मग प्रश्न फार पुढे जात नाहीत. आहे त्या परिस्थितीत आनंदात राहायचं… ईतकच तर सुखी संसाराच गमक असतं..

 

रोजच्या धकाधकीच्या जीवनात बाहेरून आलं की शांतता हवी असते…

अगदी कुठल्याही वयात…

आपला साथीदार जोडीला आहे.. एकमेकांची साथ… विश्वास आहे असं लक्षात आलं की कुठलंही दुःख झेलायला मन तयार होतं.

तरुणपणी आयुष्य धुंदीत जातं. चाळीशी नंतर भान येतं. ते भान आधीच येऊ दे… कदाचित नंतर ऊशीर झाला असेल.

 

आपली हिंदू संस्कृती स्नेह, माया, प्रेम शिकवते. त्याच्याबरोबरच नात्याची कदर आणि आदर करायला पण शिकवते. त्याचा अंगीकार करा. चॉकलेटवाल्यांच्या जाहिरातीतबाजीला आपण फसायचं का? भुलवायला नेकजण बसलेले आहेत… आपण विचार करायला हवा.

शाश्वत आनंद, सुख कशात आहे हे ओळखा. असा आनंद आयुष्याच्या शेवटपर्यंत मिळायला हवा..

हो की नाही… तो मिळाला की रोजचाच दिवस निरपेक्ष प्रेमाने भरलेला असतो.

 

एक गंमत सांगू का…

आजींना भेटायला अरुणच आला होता… पण बायकोला अरूणाला घेऊन…

आज ना ऊद्या आजी हे आजोंबांना सांगणारच.. असेच छोटे आनंद घेत दोघेजण जगत आहेत…

आता हा लेख आधी का पाठवला हे तुम्ही ओळखलंच असेल..

तुम्ही सुज्ञ आहात..

घेताल समजून…

 

मग शीर्षक हे का घेतले? असा तुम्हाला प्रश्न पडला असेल..

तुम्ही त्याशिवाय वाचणार नाही हे मला माहीत होतं म्हणून…

© सुश्री नीता चंद्रकांत कुलकर्णी

मो 9763631255

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ कोण्या एकाची जीवनगाथा… ☆ श्री संदीप सुंकले (दास चैतन्य) ☆

श्री संदीप सुंकले (दास चैतन्य) 

? मनमंजुषेतून ?

☆ कोण्या एकाची जीवनगाथा… ☆ श्री संदीप सुंकले (दास चैतन्य) 

“कही दूर जब दिन ढल जाए… “

ही ओळ कानावर पडली आणि मला आनंद सिनेमा आठवला…

राजेश खन्ना आणि त्याचा अजरामर संवाद…!

“जिंदगी बडी होनी चाहिए.. 

लंबी नहीं…!! “

विचार केला तर सहा शब्दांचा संवाद, पण त्यात साऱ्या जन्माचं सारं…

मध्ये एक वाक्य वाचनात आले…

 

येणारा पुढील प्रत्येक श्वास म्हणजे वाढदिवस…

त्या दिवशी हे गीत आठवले नाही, पण हे गीत ऐकल्यावर ते वाक्य आठवले…

जिंदगी बडी करायची असेल तर आयुष्यातील प्रत्येक श्वासाचे मोल जाणले पाहिजे…

विश्वास आहे तो पर्यंत श्वास आहे…

त्याचा आपल्यावरील विश्वास संपला की तो आपले श्वास संपवतो…

ज्याप्रमाणे क्षणा क्षणाने आयुष्य बनते, तसे श्वासा श्वासाने जीवन बनते असे म्हणता येईल…

प्रत्येक श्वास आणि प्रत्येक क्षण आनंदानें व्यतित करता आला तर…

सर्व महान व्यक्तींनी हेच सुचविले आहे…

– — मी जगायला सुरुवात केली…

….. एक पथिक.

© श्री संदीप सुंकले (दासचैतन्य)

मो. 8380019676

 ≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ “प्रेमपत्र…” ☆ सुश्री शीला पतकी ☆

सुश्री शीला पतकी 

? मनमंजुषेतून ?

☆ “प्रेमपत्र…” ☆ सुश्री शीला पतकी 

प्रेमपत्र – – – 

पुणे येथील ‘ गाणे मनामनांचे ‘ या संस्थेकडून आजी आजोबांसाठी प्रेमपत्र स्पर्धा आयोजित करण्यात आली होती त्यामधून पाच सर्वोत्तम पत्राची निवड केली जाणार होती. या स्पर्धेत भाग घेण्यासाठी माझ्या एका मैत्रिणी च्या भाच्याने मला आग्रह केला आणि माहिती पाठवली. मग मी या स्पर्धेसंबंधी विचार करायला लागले…. प्रेम पत्र तर आजपर्यंत कोणाला लिहिले नाही… त्याचा विचारही केला नाही… विषय अवघड… लेखणी थांबली…! आता काही अनुभवी लोकांचा सल्ला घ्यावा म्हणून एका गटातील मैत्रीणीला फोन केला… ती म्हणाली, “नाही हो शीला ताई असलं काय नसतंय बघा मी तर कधी लिहिलं नाही” आता अनुभवी लोकांकडून पहिला नकार आला. माझ्या एका मैत्रिणीला… तिचा प्रेम विवाह होता…. तिला विचारलं…. एकाच गावात असल्यामुळे आम्ही कधी पत्र लिहिले नाही… तिने उत्तर दिले. विषय असा होता की ज्याच्यावर तुमचे प्रेम आहे अशा कुणालाही तुम्ही पत्र लिहा भावाला बहिणीला आईला देशाला मैत्रिणीला.. प्रेम पत्र म्हणले की प्रेम पत्र हे प्रियकरालाच लिहिले पाहिजे अशी माझी तरी धारणा…. मग मी विचार करून प्रेम पत्र लिहिण्याचा निर्णय घेतला… कलावंताला जशा सगळ्या भूमिका निभावता आल्या पाहिजेत तशा लेखकाला कोणत्याही विषयावर लिहिता आले पाहिजे. असे मनाला बजावले आणि प्रेम पत्र लिहायला सुरुवात केली जरा संकोच वाटत होता. ज्याचा कधी तरुण वयात विचार केला नाही ते आता म्हातारपणी विचार करायची वेळ आली…. पण शेवटी स्पर्धा होती त्यातून पाच सर्वोत्तम पत्राची निवड केली जाणार होती..! पारितोषिक हा भाग आता महत्त्वाचा राहिला नाही आता एक्सेप्ट द चॅलेंज हा भाग महत्त्वाचा आहे, किंबहुना आता या विषयापुरता तरी तो वाटला आणि मग लिहायला बसले. पत्रलेखन पूर्ण झाल्यावर अनुभवी माणसांचा थोडा सल्ला घेतला… बरे झाले आहे का? असे विचारले.. काही चुकत तर नाही ना याबद्दल खात्री केली आणि ते स्पर्धेला धाडले……… आणि मला सांगायला अतिशय आनंद वाटतो की पाच सर्वोत्तम पत्रामध्ये माझ्या पत्राची निवड झाली असा एक मेसेजही फेसबुक वर आला मला आनंद यासाठी झाला की अनुभवातून लिहिणारी मी किंवा अनुभवामुळे लेखन करणारी मी पण या विषयात मात्र प्रचंड कल्पनाशक्तीचा वापर करून मी हे लेखन केले आहे आपल्या ग्रुप वर ते पत्र टाकते आहे वाचा आनंद घ्या त्रुटी असतील तर कळवा म्हणजे पुढे काही स्पर्धा असतील तर सुधारणा करता येतील माझ्या लेखनाला आपले सर्वांचे प्रोत्साहन नेहमीच लाभले आहे त्यातूनच ही प्रगती….!

धन्यवाद! – ते पुरस्कारप्राप्त पत्र असे – – –

प्रिय वसुधा,

लग्नाला 40 वर्षे झाली पण तुला प्रेम पत्र काय साध कार्डही लिहणे जमलं नाही. वसु आपल्यामध्ये व्यक्त होण्याची पद्धतच नाही पण आज मात्र मी ठरवलंय माझ्या मनातलं सगळं तुला सांगायचं… ऐकतेस ना..?

वसु मी पहिल्यांदा तुला पाहायला आलो ना माझ्यासमोर एक वीस वर्षाची लांब सडक केसांची किंचित सावळी टपोऱ्या डोळ्यांची एक गोड मुलगी हातात ट्रे घेऊन आली.. खरं सांगू मी त्याच वेळेला खलास…. मनाने ताबडतोब सांगितलं… “अरे हीच माझी वहिदा” मन गुणगुणायला लागलं… चौधविका चांद हो या आफताब हो.. हृदयात वाजे समथिंग… डोक्यात घंटा वाजायला लागल्या.. मंजुळ सुरेख… माझी पसंती तेव्हाच झाली.

माझ्या तीन खोल्यांच्या घरात निशिकांतची बायको म्हणून तू प्रवेश केलास.. घरात कसला प्रत्येकाच्या मनात प्रवेश केलास. तीन खोल्याचं छोटसं घर सगळं तू आपलं केलं. आईच्या मार्गदर्शनाखाली तू सगळं उत्तम निभावून नेलं. वसु त्या तीन खोल्यात आपल्याला म्हणावा तसा एकांत मिळत नव्हता. मग काय नजरेचे खेळ! जेवायला बसल्यावर मी चटणीचे बोट जिभेवर ठेवून टक् टक् करायचं आणि ओठावर बोट ठेवायचं आई ओरडायची… काय रे आवाज करत जेवतोस… पण तो आपला एक वेगळाच इशारा होता. तू पटकन तोंड लपवून पाठमोरी होऊन हसायचीस. आणि हातावर सुपारी ठेवताना हळूच चिमटा काढायची… मी आई गss असं ओरडायचं.. आई म्हणायची काय रे…? काही नाही ऑफिसला चाललोय… किती रोमँटिक दिवस होते ना!

ऑफिसातून येताना मी तुझ्यासाठी गजरा आणायचो ते कोणाला कळू नये म्हणून देवासाठी मोगरा असलेली फुलपुडी आणायची. मग ते आठ बाय आठच्या खोलीत… खोलीभर तो मोगरा दरवळायचा मग काय…

मी मोगरा माळवतो तुला.. आणि शब्द ओठात घोळतो

शब्द रेंगाळतो जिभेवर.. मौन संवाद साधतो //

प्रेमाचा संवादच आगळा.. देह सारा बोलतो..

शब्दांचे मुके पण तिथे जरी.. भाव संवाद साधतो//

अशी मुक्या संवादाची सुरुवात व्हायची शब्दाच्याही पलीकडची भाषा समजण्याचे आपले प्रेम.. कधी बोलावच लागलं नाही. पण या मोगऱ्या पलीकडे मी तुझी कोणतीच हौस करू शकलो नाही ना?

वसु पण खरं सांगतो माझ्या आयुष्यात तू आलीसआणि तू माझी प्रेरणा झालीस कुणासाठीकाही करून दाखवावं अशी तू एकटी होतीस तुझ्यामुळे माझा आत्मविश्वास दुणावला पुढे पुढे जात राहिलो आणि मागे तू धावत राहिलीस बिनतक्रार.!

गाण्यातली विशारद तू गाण्याचे क्लास घरी घेताना तुझा रियाज व्हायचं तेवढाच खूप वाटायचा तुझ्या मांडीवर डोकं ठेवून झोपाव तू एखादी सुंदर चीज माझ्यासाठी गात रहावी पण असं आपल्याला हे जमलं नाही ना. कधी चार माणसाच्या घरात असं प्रेम करता येत नाही म्हणतात, खरं आहे ते! मी तुला काही देऊ शकलो नाही पण प्रेम मात्र भरभरून दिल. जागेचा अभाव आणि माणसांची रेलचेल असलेले छोट्या घरात आपले प्रेम मात्र अभावातल्या ऐश्वर्या सारखे वर्धिष्णू झाले मग त्या प्रेमात थोडी असूया आलीच… तुझा मामेभाऊ सुभाष जेव्हा आला आणि तुझ्याशी सुधी सुधी म्हणून बोलायला लागला तेव्हा माझा संताप झाला होता, पण एक दिवसासाठी आला म्हणून गप्प बसलो. तुला आठवतंय त्यावेळेला माझा राजकपूर झाला होता. मी एक गाणं गुणगुणत होतो.. तूम अगर मुझको ना चाहो तो कोई बात नही तुम किसी गैर को चाहोगी तो मुश्किल होगी…. तो पोपट्या तुझा भाऊ असल्यामुळे तुझा हात धर धरून बसवत होता आणि बोलत होता.. सुधी असं सुधी तसं माझा जरा तोल गेलाच. मी म्हणलं.. “अरे वसुधा नाव आहे तिचं “तो म्हणाला, “चालते हो भाऊजी मी हिला नेहमीच सुधी म्हणायचो” तो गेला तेव्हा मी खूप रागावलो होतो तुझ्यावर आणि तू हसत होतीस. म्हणालीस, ” आज काहीतरी जळलं बाई घरात “तो रुसवा फुगवा दोन दिवस चालला होता आणि मग तू माझ्यासाठी खास विणलेला स्वेटर मला सरप्राईज भेट दिलास त्या स्वेटर पेक्षा तुझ्या प्रेमाची उब होती. प्रेमात मी पुन्हा एकदा न्हाऊन निघालो… सगळा रुसवा गळून गेला फक्त उब शिल्लक. वसु तु मला एक नाव ठेवलं होतं फक्त आपण दोघं असतानाच तू मला हाक मारायची… *निक* निशिकांतचा निक झालो…! आपण पुढे आपल्या मुलांच्या जबाबदाऱ्या आईच आजारपण यात सगळं हरवून गेलो नाही? मग तू मला बाबा म्हणायला लागलीस कारण आता मुलांचा बाबा झालो होतो ना मी…! दिवस भराभर सरले केसातली चांदी गडद झाली. वसु तुला आठवतं आई गेली त्या रात्री मी पार कोलमडलो होतो तिचं सगळं झाल्यानंतर मी एके रात्री तुझ्या मांडीवर डोकं ठेवून हमसून हमसून रडलो होतो तेव्हा तू माझी पत्नी नव्हतीस तर आई झाली होतीस तेव्हा हे वाक्य मला जास्त पटलं की” स्त्री ही क्षणाची पत्नी आणि अनंत कालची माता असते”… अगं किती भूमिका निभवल्यास बायको आई बहीण आणि छान मैत्रीण पण मी मात्र तुला प्रेमाचे दोन शब्द काही मोकळेपणाने बोलू शकलो नव्हतो… पण तुला माझ्या डोळ्यात, स्पर्शात हे बहुदा दिसत असावं म्हणूनच इतक्या समाधानांन माझा संसार मार्गी लावलास… आता तुझे चांदण्याचे हात सखे माझ्या गळा हे असेच निरंतर ठेवशील ना? आता आपण दोघेच… अभी ना जाओ छोडके के दिल अभी भरा नही… आता एकमेकांपासून दूर होणे नाही आता देवानंद नाही आता फक्त तुझा निकी आता इतकंच खरं आहे की हमे तुमसे प्यार कितना हम नही जानते मगर जी नही सकते तुम्हारी बिना हेच खर. खरं तर आपलं प्रेम शब्दात मांडण्याच्या पलीकडे पण जमतील तेवढे शब्द जमवून लिहिले आहेत. वसु खाली माझ्या ओठाचा एक ठसा उमटवलाय त्याच्यावर तुझे ओठ टेकव उरलेलं सगळं माझ्या मनातला आपोआप तुझ्या हृदयात उतरेल करशील ना एवढं….?

तुझाच निकी उर्फ निशिकांत उर्फ अहो ss

© सुश्री शीला पतकी

माजी मुख्याध्यापिका, सेवासदन प्रशाला सोलापूर 

मो 8805850279

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ “दोनशे साठ रुपयांचे कर्ज…” ☆ डॉ. धनंजय देशपांडे ☆

डॉ. धनंजय देशपांडे

? मनमंजुषेतून ?

☆ “दोनशे साठ रुपयांचे कर्ज…” ☆ डॉ. धनंजय देशपांडे 

 – – जे आजही माझ्या डोक्यावर आहे.

पुण्यात आल्यावर आधी भाड्याच्या घरात होतो, नंतर स्वतःचा फ्लॅट झाला.

ऑफिस देखील आधी भाड्याचे व नंतर स्वतःचे झाले. दोन्ही मालमत्ता अर्थातच कर्ज काढून घेतलेल्या मात्र घराचे हप्ते वेळेवर अन ऑफिसचे तर वेळेपूर्वीच संपवले.

पण तरी मी स्वतःला आजही कर्जमुक्त मानत नाही. त्याचे एक कारण आहे आजही मी आज ही मी दोन माणसांचे मिळून दोनशे साठ रुपये देणे बाकी आहे. त्याचीच हि चित्तरकथा.

घटना आहे १९८८ सालाची. अभिनव चित्रकला महाविद्यालया ची शेवटच्या वर्षाची परीक्षा त्या काळात मुंबईच्या जे. जे. मध्ये व्हायची.

दहा दिवस मुंबईत राहावं लागायच. परीक्षेची वेळ सकाळी दहा ते संध्याकाळी पाच अशी असली तरी त्यावेळेत तिथं असलंच पाहिजे असं नसायचं.

एकूण दहा दिवसात चार पेपर तुमच्या सोयीने सोडवायचे. त्यामुळे कधी कुणी लेट यायच तर कुणी लवकर संध्याकाळी लवकर जायचे.

दहा दिवसासाठी एकूण खर्च म्हणून अडीचशे रुपये घेऊन पुण्यातून मी मुंबईत गेलेलो. माझ्या मोठ्या भावाचे एक मित्र सायन इथं राहायचे. त्यांच्या घरी माझी सोय त्याने करून दिलेली. तिथून जे. जे. ला रोज जाणे येणे करायचो.

पहिल्या दिवशी लोकल ट्रेनने तिकीट वगैरे काढून व्यवस्थित निघालो. जे. जे. कॉलेजच्या स्टेशन वर उतरलो.

हाताशी थोडा वेळ होता, तर लिंबूसरबत घ्यावे म्हणून तिथल्या गाडीवर गेलो. त्यावेळी काहीतरी तीन रुपयात शरबत मिळायचे. तर पैसे काढून देण्यासाठी खिशात हात घातला अन शॉक बसला. कारण माझा खिसा ट्रेनमध्ये मारला गेला होता.

माझ्या डोळ्यासमोर अंधारी आली. हातापायात लटलट सुरु झाली. कारण आता पुढचे दहा दिवस जगायचं कस? आता वर्ष वाया जाणार की काय पुन्हा? कोण देणार या मुंबईत मला पैसे? असं सगळं आठवून डोळ्यात पाणीच आलं. काहीच सुचेना.

माझी हि अवस्था त्या सरबतवाल्या भय्याला कळली. त्याने मायेने विचारलं,

‘क्या हुआ बेटा? ’

मला मग अजूनच रडायला येऊ लागलं. भय्याने मग तिथल्या स्टूलवर बसवलं.

आधी साधं पाणी दिलं. मी घटाघटा प्यायलो. त्याला सांगितलं की, ‘ मेरी जेब किसीने काटी है. ’

मी मुंबईत नवीन असल्याचे त्याने ओळखून त्याने इतर चौकशी केली की, कुठून आलास, मुंबईत काय काम काढलं वगैरे.

मी ते सगळं सांगितलं अन आता माझ्या परीक्षेचे काय? हि काळजी बोलून दाखवली.

त्याने विचारलं, ‘ बम्बईमे और कोनो नाही का पहचान में? ‘

मी म्हंटल, ‘ एक मावस भाऊ आहे. गोरेगावला राहतो अन दादरला महाराष्ट्र बँकेत आहे. पण त्याचा डिटेल पत्ता माहित नाही. ‘

यावर भय्याने काय करावं?

आधी मला शरबत प्यायला दिलं. ‘ पीओ बेटा, पैसे नाही लुंगा. ’

अन नंतर त्याने त्याच्या खिशातून दहा रुपये काढून मला दिले व म्हणाला, ‘ दादर को जावं ट्रेन पकडकर, वहा किसी पुलिस से बँकका पता पूछो. भाई मिल जायेगा. आनेजाने का भाडा दिया है. अगर उहा काम नही हुआ तो यहा फिर आ जाना. कुछ करेंगे ‘

माणसात देव असतो, हे मी नेहमी मानत आलो ते याच कारणासाठी. अन त्या भय्याने सांगितल्यानुसार दादरला गेलो. पोलिसाने नीट पत्ता समजावून सांगितल्यावर मी बँकेत गेलो. आत जाताच समोरच भाऊ दिसला.

तोही चकित, मी अचानक आलेलं पाहून. त्याच्या समोर जाऊन बसलो अन थोडक्यात परीक्षेसाठी आलोय. सायंनला सोय झालीय राहण्याची वगैरे सांगताना परत एकदा डोळ्यात पाणी आलं.

त्याला बहुतेक अंदाज आला असावा. कारण त्याने थेट विचारलं की, ‘ पाकीट मारलं गेलंय कां? ‘ मी मानेनेच हो म्हणून सांगितलं.

त्याने फक्त इतकंच विचारलं, किती होते खिशात, मी सांगितलं अडीचशे. भावाने काहीही न बोलता त्याच्या खिशातून अडीचशे काढून मला दिले.

मी म्हटलं, ‘ पुण्यात गेलो की लगेच मनीऑर्डरने पाठवतो. ’

तो म्हणाला, ‘ असू दे. ते नंतर पाहू. तू आता शांतपणे परीक्षेला जा. मन शांत कर. अन अजून काही लागलं तर फोन करून कळव. ’

– असं म्हणून त्याने बँकेचे त्याचे कार्ड मला दिले. ते घेऊन मी निघालो. जीव भांड्यात पडला होता.

पटकन ट्रेन पकडून पुन्हा जे. जे. ला आलो. तरी या घोळात माझे दोन अडीच तास गेले होते. मात्र वेळेचं बंधन असं नसल्याने ती काळजी नव्हती.

त्या दिवशीचा पेपर सोडवणे सुरु केले. म्हणजे पोस्टर करण्याचा तो विषय होता. अन संध्याकाळी बाहेर पडल्यावर आधी त्या सरबतवाल्या भय्याकडे गेलो. खिशातून अडीचशे मधले दहा रुपये काढून त्याला दिले.

मनाची तयारी केलेली की, आता २४० रुपयांत भागवायच आहे. ते जमवू म्हटलं. अन भय्यापुढे दहाची नोट काही न बोलता धरली.

सकाळचा मीच तो मुलगा, त्याने ओळखलं. प्रसन्न हसून म्हणाला, ‘ काम हुई गवा न? ‘ मी हो म्हटलं अन त्याला सांगितलं की, ‘ ये आपके दस रुपये. ’

तो म्हणाला. ‘ बेटा, रहने दो, फिर कभी किसी को जरुरत पडे तो उसे तुम काम आ जाना. बास, मेरे पैसे उसी दिन मुझे मिल जायेंगे. ’

मी थक्क झालो. एक उच्चपदस्थ व उच्च शिक्षित मोठा बँकेतील माणूस अन एक फुटपाथवरचा अशिक्षित भय्या पण दोन्ही त्यावेळी मला देवाची रूपे दिसली.

नंतर पुण्यात आलो. नोकरीला लागलो. त्याच काळात तो मुंबईचा भाऊ एकदा माझ्याकडे पुण्यात आला तेव्हा आवर्जून त्याला ते अडीचशे परत देत होतो तर तो म्हणाला,

‘मोठे झाले आता बाळासाहेब तुम्ही. असू द्या पैसे तुमच्याकडे. नंतर कधी कुणाला तरी अशीच मदत कर. बास. ’

अगदी हीच सेम भावना त्या भय्या’ने मला बोलून दाखवलेलं आठवलं अन मी नतमस्तक झालो.

– – तर, हेच ते माझ्यावर अजून असलेले अडीचशे प्लस दहा असे दोनशे साठ रुपयाचे कर्ज. जे अद्याप फेडू शकलो नाहीये.

…… काही काही ऋण अशीच असावीत आयुष्यात जी फेडण्यापेक्षा मिरवण्यात आनंद वाटावा असे हे माझे कर्ज

© डॉ. धनंजय देशपांडे (dd)

(सायबर सिक्युरिटी तज्ञ, चित्रकार, लेखक, समुपदेशक, निवेदक)

मो न. ९४२२३०४३४४ 

1) Global Cyber Crime Helpline National Award winner

2) Digital Hero of the year National Award winner

3) HOD: Cyber Awareness Foundation, Maharashtra State

4) Mentor: Pune University (SPPU), CANADA and UK

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ संकल्प… ☆ सौ. उज्ज्वला केळकर ☆

सौ. उज्ज्वला केळकर

??

☆ संकल्प …  ☆ सौ. उज्ज्वला केळकर

संकल्प – – 

संकल्प करणे, म्हणजे एखादी गोष्ट नियमितपणे, न चुकता, खंड पडू न देता करणे. मला लहानपणापासून संकल्प करण्याचा नाद होता. मी ५वी-६वीत असेन तेव्हा. आम्ही मैत्रिणींनी नवं वर्षाचा संकल्प केला, पहाटे उठायचं. फिरून यायचं. मग तासभर अभ्यास करायचा. मग नेहमीच रूटीन. ३-४ दिवस तसं केलंही. त्यानंतर मात्र आमचा संकल्प आमच्यासारखाच ऊबदार पांघरुणात गुडूप झाला. मैत्रिणींना विचारलं, ‘तुम्ही जाता का रोज फिरायला? ’ त्यांचंही माझ्या सारखंच झालं होतं. ४-५ दिवसात सगळ्यांचाच संकल्प गारठून गेला होता.

शाळेत असताना, मी दरवर्षी जूनमध्ये संकल्प करी, की यंदा गृहपाठ वेळच्या वेळी आणि घरीच करायचा. काही आठवडे, महिने ते सुरळीत चालू राही. पुढे पुढे कधी नवीन छान पुस्तक मिळालं म्हणून, टी. व्ही. ची सिरिअल चांगली आहे म्हणून, बऱ्याचदा झोप आलीय म्हणून, गॅदरिंगच्या वेळी कार्यक्रमाची प्रॅक्टीस म्हणून यात खंड पडत जाई आणि माझा संकल्प गडबडून जाई. मग शाळेत थोडं लवकर येऊन, कुणाचं तरी पाहून गृहपाठ पूर्ण करायची लगबग चालू व्हायची. किंवा गृहपाठ मोठा असेल, तर तो न होण्यामागची खरी-खोटी कारणं शोधायची. पण एवढा मात्र खरं, मी दर वर्षी, जूनमध्ये नव्या उत्साहाने हा संकल्प करायचीच!

शाळेत असताना मी एकदा संकल्प केला होय, ८वीत असेन बहुधा मी तेव्हा, शाळेत कधीही कुणाशीही भांडायचं नाही. सगळ्यांनी ‘मिलनसार’ मुलगी म्हणून माझं कौतुक केलं पाहिजे. बरेच दिवस हा संकल्प निभावला. कारण ठरवलं होतं, भांडणं झाली, तरी आपण नमतं घ्यायचं. आपली चूक नसली तरी… एकदा वार्षिक क्रीडा सामने चालू होते. ८अ विरुद्ध ८ब ‘खो खो’ची मॅच होती. आम्ही दोन्ही वर्गातल्या मुली भवतीनं गोल करून खेळाडूंना प्रोत्साहन देत होतो. आमच्या वर्गाच्या टीमची कॅप्टन मीना. छानच खेळत होती. मी म्हंटलं, ’काय छान खेळतेय मीना! ’ माझ्या शेजारीच ब वर्गातली मधुरा उभी होती. ती म्हणाली, ‘नीता जास्त चांगली खेळतेय! ’ मी म्हंटलं, ‘नाही मीनाच जास्त चांगली खेळतेय. ’ ‘मुळीच नाही नीता… ‘ मीना… नीता… मीना… नीता… ’ आणि जुंपलीच की आमची. मॅच संपली मीना-नीता गळ्यात गळे घाळून खो खोच्या मैदानातून बाहेर आल्या. आमचं आपलं ‘मीना… नीता… ’ चालूच. मग काय माझ्या संकल्पाची झाली ना ऐशी न् तैशी!

पुढे कॉलेजमध्ये गेल्यावर संकल्प केला, आता स्टडी रूममध्ये फक्त अभ्यासाची पुस्तके वाचायची किंवा संदर्भ ग्रंथ बघायचे. पण काऊंटरवर एखादा देखणा कविता संग्रह किंवा कथा संग्रह किंवा कादंबरी दिसली की आपोआपच ती पुस्तके चाळली जात. आणि नकळतच त्यातले पुस्तक नोंद करून घेतले जाई आणि मी बैठक जमवून वाचायला सुरुवात करी. पानामागून पाने उलटली जात आणि संकल्प बिचारा बापुडवाणा होऊन मान खाली घालून बसे.

याच वयात काही कविता आवडणार्याी आणि करणार्याासुद्धा काही मैत्रिणी भेटल्या. मग आम्ही सगळ्यांनी संकल्प केला, रोज एक कविता करायची. पहिले दोन –तीन दिवस काही तरी नवे नवे सुचत गेले. नंतर नंतर काही सुचेना. कविता संग्रह चाळून नवीन विषय शोधत राहिलो. ‘र ला र आणि टला ट’ जुळवून कविता करत राहिलो. मग तेवढेही जमेना. भवतीनं अनेक विषय दिसत होते. सुचतही होते, पण ते कवितेत यायला मात्र तयार नव्हते. शेवटी नाईलाजाने रोज एक कविता करायची, निदान चार ओळी तरी लिहायच्याच, या संकल्पाला पूर्णविराम द्यावा लागला. तशी अजूनही मी कविता करते म्हणा, पण रोज एकाचं सृजन व्हावं, अशी प्रतिभा देवाने नाही दिली.

एकदा संकल्प केला रोजनिशी लिहायची. रोज जे घडलं, ते लिहून ठेवायचचं. अनेक थोरा-मोठ्यांनी रोजनिशा लिहीलेल्या आहेत. त्यातल्या काही ना काही, कोणत्या ना कोणत्या स्वरुपात छापूनही आल्या आहेत. मग मी १ जानेवारीपासून मोठ्या उत्साहाने रोजनिशी लिहायला लागले. वाटलं, न जाणो आपल्याही रोजनिशीला हे भाग्य लाभेल. पण ८-१० दिवस रोजनिशी लिहिल्यावर लक्षात आलं, सकाळी उठले. कॉलेजमध्ये गेले. स्टडीत बसून आभ्यास केला. घरी आले. जेवले. टी. व्ही. बघितला. झोपले. रोज तेच ते. तेच ते. कधी बदल म्हणजे तास बुडवून टेबल-टेनीस खेळले. किंवा ‘मॅटिनीला ‘प्यासा‘ बघायला गेले. चित्रपटाने भारून टाकले. गाणी तर… अहाहा… कधी तरी बदल म्हणजे, आज अभ्यास सोडून कथा-कादंबार्याण वाचते, म्हणून बाबा रागावले. नवीन ड्रेस घ्यायला आई नाही म्हणाली, म्हणून मी रूसले. असे सटर फटर बदल. मनन, चिंतन म्हणतात, ते काही घडतच नव्हतं, तर रोजनिशीत कसं उतरणार? शेवटी तेच तेच लिहून मी इतकी कंटाळले, की माझं रोजनिशी लेखन मी थांबवलंच!

लग्नं झालं. नव्या नवलाईचे अद्भूतरम्य, स्वप्नील वगैरे, ‘तू म्हणशील तसं’ म्हणायचे दिवस सरले. वास्तव जीवनात ‘मी म्हणेन तसं’ असं ‘तू.. तू… मैं… मैं’ चालू झालं. ‘नळ का बंद केला नाहीस? दिवा का मालवला नाहीस? ’ अशा साधा साध्या प्रश्नांवरून वाद झडू लागले. त्यातून भांडणे होऊ लागली. या वादा-भांडणाला कंटाळून मी एकदा संकल्प केला, की नवर्या शी अबोला धरायचा. बोललंच नाही, तर वाद- भांडणं होतीलच कशी? टाळी एका हाताने थोडीच वाजते. दोन दिवस अबोल्यात गेले. तिसर्याह दिवशी हे ऑफीसमधून सांगत आले, ‘आज रात्री तुझे आई-बाबा आपल्याकडे येताहेत. आठवडाभर रहाणार आहेत. त्यांचं काही काम आहे. आता त्यांच्यादेखत न बोलता कसं रहाता येईल? विचारल्या प्रश्नांची उत्तरे तरी नकोत का द्यायला? झालं! माझा अबोला बोंबलला.

नेहमीसारखा संसार झाला. उतारालाही लागला. अधून मधून मला नवे नवे संकल्प करण्याची हुक्की येते. मी नव्या उत्साहाने ते करतेही पण… नित्यनेमाने होणार्याा पानगळीप्रमाणे ते गळून पडतात. माझे संकल्प हा घरात आता चेष्टेचा विषय झालाय. मुले दर वर्षी न चुकता १ ज्ंनेवारीला विचारतात, ‘आई, यंदा कोणता संकल्प करणार आहेस तू? ’ मी तितक्याच खेळीमेळीने उत्तरते, ‘बघू या. ठरवलं नाही अजून! ’

असाच एक संकल्प. मुलं आता मोठी झालीत. त्यांना सगळं कळतं. त्यांचे निर्णय ती घेऊ शकतात. त्यांना काही बोलायचं नाही. त्यांना काही विचारायचा नाही. काही सांगायचं नाही. रागावायचं तर नाहीच नाही. पण मुले शिस्तीच्या नावाखाली, त्यांच्या मुलांना बोलली, रागावली, कधी मारलंसुद्धा… नातवंडांचे चेहरे हिरमुसले झाले, की मग पडावं लागतंच ना मधे? अखेर, संकल्प महत्वाचा की नातवंडे महत्वाची? परिणाम काय? संकल्प सिद्धी नाही.

यंदा मात्र नव वर्षाला मी असा संकल्प केला आहे, की सिद्धीला जाईलच जाईल. कोणता संकल्प विचारताय? अहोsss यापुढे कधीही संकल्प न करण्याचा संकल्प केलाय मी यंदा!

© सौ. उज्ज्वला केळकर 

संपर्क – निलगिरी, सी-५ , बिल्डिंग नं २९, ०-३  सेक्टर – ५, सी. बी. डी. –  नवी मुंबई , पिन – ४००६१४ महाराष्ट्र

मो. 836 925 2454, email-id – kelkar1234@gmail.com 

≈संपादक –  श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ माझी जडणघडण… जुनं ते सोनं  भाग – ७७ ☆ सौ राधिका भांडारकर ☆

सौ राधिका भांडारकर

??

☆ माझी जडणघडण… जुनं ते सोनं – भाग – ७७ ☆ सौ राधिका भांडारकर ☆

(सौजन्य : न्यूज स्टोरी टुडे, संपर्क : ९८६९४८४८००)

जुनं ते सोनं 

वास्तविक मी, आमच्यावेळी असे काही नव्हते बाई! असे म्हणणार्‍या सदरातील व्यक्ती नाहीच. मला बदल आवडतात. जे जे नवीन ते संपूर्णपणे स्वीकारले नाही तरी त्यांची ओळख असावी असे मला वाटते. तरुण पिढीबरोबर तसे माझे चांगले जमते. त्यांची बदललेली भाषा, बदललेली जीवनपद्धती, त्यांची वस्त्रसंस्कृती, खाद्यसंस्कृती, अत्याधुनिक तांत्रिकतेशी त्यांची असलेली निस्सीम मैत्री, याविषयी मला प्रचंड कुतुहल असते. खरोखरच जग किती बदलले याचे विलक्षण नवल वाटते.

पण तरीही ऐंशीच्या उंबरठ्यावर अनुभवाचा अधिकार गाजवून, सतत त्यांना धोक्याच्या सूचना देण्यात मला काही कर्तव्य बजावल्याचा आनंद होत नसतो. काळाप्रमाणे बदल हे होणारच.

अगदी त्यांच्या हातात हात घालून नाही शकलो तरी त्यांच्या पाठीमागे, कधी सोबतीने, कधी बरोबर जायला हवे असे मला वाटते.

माझ्या आयुष्याचा, मागे वळून जेव्हां मी मागोवा घेते, तेव्हा मला जाणवते की मीही बदललेच आहे की! लहानपणी मी पाटे वरवंटे, उखळ, जाते, चूल, शेगडी,

बंब या वस्तुंसोबत वाढले, ते सारे मला सोडून गेलेच की! का मी त्यांना सोडले? (पण आता ते अँटीक पीसेस म्हणून माझ्या घराचे डेकॉर आहेत.)

आता माझ्या घरात सगळी ईलेक्ट्राॅनीक गॅझेट्स आहेत आणि त्या केवळ चैनीच्या वस्तु नसून माझ्या आयुष्याच्या गरजाच बनल्या आहेत. मग हे नेमकं कधी झालं, कां झालं, या प्रश्नांच्या भानगडीत मी तरी कुठे पडले? ई मेल्स, व्हाॅट्सॲप, फेसबुक या परिवारात मीही पार बुडालेली आहे. किती बदलले मी? मी सुखी आहे का? आनंदी आहे का? निदान मजेत तरी आहे का याचा विचार तरी मी करते कां?

पण त्यादिवशी, एक गंमत झाली.

कुरीअरवाल्याने, एक सफेद रंगाचा, गुळगुळीत लिफाफा माझ्या हातात ठेवला. तो जेव्हां मी उघडला तेव्हां त्यात, रेघा असलेल्या कागदावर सुंदर अक्षरात लिहिलेले, माझ्या बहिणीचे पत्र होते. खरं सांगू! इतक्या वर्षांनी आलेले, धाकट्या बहिणीचे ते स्वअक्षरातले पत्र पाहून एक अनामिक आनंदाची लाट फुटली. वाचण्याआधीच

डोळे पाणावले. कितीतरी वेळ मी तिच्या अक्षरांवर नुसता हात फिरवत राहिले. एक प्रचंड उर्जा होती त्यात. ते निर्जीव नव्हते. उबदार होते. आणि मग जाणवले,

शेवटी, “जुनं तेच सोनं!”

ओहायोला मुलीकडे असताना, जवळच राहणार्‍या तिच्या मैत्रीणीने आम्हाला जेवायला बोलावले होते. अत्याधुनिक

पद्धतीने सजवलेले तिचे घर सुंदरच

होते. मात्र माझ्या लक्षात राहिले ते

तिच्या मुख्य दरवाजाजवळचे तुळशी वृंदावन! घरात शिरतानाच दिसलेली कोनाड्यातली गणपतीची मंगलमूर्ती!

जेवणाचा तर अगदी साग्रसंगीत बेत होता. शिवाय चकचकीत स्टीलची ताटे, वाट्या, चमचे, पेले यांची सुरेख मांडलेली पंगत! टेबलावर का असेना,

त्यात जुन्या आठवणी जपलेल्या होत्या.

श्रीखंडपुरी, बटाट्याची पिवळी भाजी, नारळाची चटणी, मसालेभात असा पक्का महाराष्ट्रीयन बेत. सर्वच तिने खपून केले होते. मला वाटले, माझ्या सारख्या जुन्या पिढीच्या प्रतिनिधीला आमंत्रित केल्यामुळे तिने हे सारे केले असावे. पण जेवताना तीच म्हणाली,

“काकू मला हे फार आवडतं. या परंपरा इथे वाढणार्‍या माझ्या मुलांनाही कळायला हव्यात ना? शेवटी ना काकू ते काय म्हणतात ना, जुनं ते सोनं, तेच खरं! “

बरं वाटलं मला. कुठेतरी धागे अतूट

असल्यासारखे वाटले.

दरवर्षी आम्ही आमच्या गावी जातोच. खानदेशातले एक खेडेवजा शहर. तसा आता जुना वाडा राहिला नाही. तिथे राहणार्‍या भावांनी नव्या पद्धतीचे घर बांधले. अधुनिकीकरण केले. मात्र नवे जुने गळ्यात गळे घालून आहेत.

आम्ही गेलो की माझी जाऊ अंगणात मस्त चूल पेटवते. भांड्याला मातीचं बुड लावून, त्यात एखादा सणसणीत रस्सा बनवते. लोखंडी तव्यावरच्या, चुलीच्या जाळावर शेकलेल्या, खरपूस गरम भाकर्‍या आणि खास लाकडी बडगीत ठेचलेला हिरव्या मिर्चीचा

ठेचा! तोडच नाही त्याला. आणखी एक.

चकचकीत घासलेल्या तांब्याच्या बंबातल्या कडथ पाण्याचे स्नान! सारेच अपूर्व!

गावात फेरफटका मारताना कुणी,

“राम राम पावनं! “म्हणताना ऐकले की,

हाय, हॅलो, व्हाट्सप, चि… ल, हे शब्द किती पोकळ वाटतात! गावरान शब्दातला गोडवाच न्यारा!

कोरोनाच्या काळात, सुरक्षित अंतर ठेवा, या नियमाचे पालन करताना आवर्जून सांगितले गेले, नको शेकहँड, नको मिठ्या, नको मुके. हात जुळवून केलेला नमस्कारच पुरे. मग ही तर भारतीयांची पूर्वापार चालत आलेली संस्कृती.

बाहेरुन आलेल्या माणसाने

घरात येण्यापूर्वी परसातल्या नळाखाली पाय धुवूनच यायचे.. अशा कितीतरी

जुन्या विचारांची दारे पुन्हा उघडली आणि त्यातून सुवर्णमयी वारे वाहू लागले. ”जुने जाऊद्या मरणालागूनी”

असे म्हणायच्या ऐवजी तेच जुने सोन्यासारखे वाटू लागले.

काल लेकीने व्हाॅट्सॲपवर फोटो पाठवले होते.

दोन शुष्क झाडाची खोडे, शंकुच्या आकारात बार्बेक्यु ट्रेवर बाहेरच्या डेकवर ठेवली होती. त्यांना फुलापानांनी सजवले

होते. नारळ बांधला होता. पायाशी रांगोळी रेखाटली होती. होळीपूजनासाठी

तबक सजवले होते. पुरणपोळीचा नेवैद्य दाखवला होता.

त्या पेटत्या नाविन्यपूर्ण होळीची चित्रं पाहताना मला खूप मजा वाटली.

खाली कॅप्शन होती.

“आमची अमेरिकन बार्बेक्यु होळी! “

हे विडंबन नव्हतं. एक गोड आनंदमयी अर्थपूर्ण संकेताचं ते पालन होतं.

अधुनिकतेत जुने सांभाळण्याची धडपड होती. मला खूप छान वाटले.

आयुष्याची, जुन्या नव्याची ही मिसळही मला खमंग रस्सेदार वाटली.

सृष्टीचाच नियम आहे. काहीच नाश

पावत नाही. होते ते फक्त स्थित्यंतर.

जुने—नवे—जुने हे एक चक्र आहे.

जुन्यातून नवे अन् नव्यातून पुन्हा जुनेच.

आणि मग आपण सहज म्हणतो,

“जुनं तेच सोनं! “

 क्रमशः…

© सौ. राधिका भांडारकर

पुणे

मो.९४२१५२३६६९

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ इंद्रायणी काठी… ☆ श्री विश्वास देशपांडे ☆

श्री विश्वास देशपांडे

??

☆ इंद्रायणी काठी… ☆ श्री विश्वास देशपांडे ☆

लहानपणी मला एक अभंग फार आवडायचा. त्यावेळी आजच्यासारखी गाणे ऐकण्यासाठी साधने नव्हती. कधी काळी रेडिओवर हा अभंग लागला की मी जीवाचे कान करून ऐकत असे. त्यावेळी त्या अभंगातला अर्थ फारसा कळत नसे. पण अभंगातील गोडवा आणि तळमळ मनाला स्पर्शून जात असे. तो अभंग होता जगद्गुरू संत तुकाराम महाराजांचा-

चंदनाचे हात पाय ही चंदन, परिसा नाही हीन कोणी अंग

दीपालाही पाठी पोटी अंधकार, सर्वांगे साकर अवघी गोड.

तुका म्हणे तैसा सज्जनापासून, पाहता अवगुण मिळेचिना.

सुमन कल्याणपूर यांनी आपल्या विलक्षण गोड आवाजात हा अभंग अजरामर केला आहे. आजही हा अभंग लागला की मी त्यात हरवून जातो. मग समोरचा माणूस माझ्याशी कितीही महत्वाचे बोलत असला तरी माझे त्याकडे लक्ष नसते. मग कधी कधी, “ अहो, मी काय म्हणतो? कुठे हरवलात? ” यासारखी वाक्ये ऐकण्याची मी तयारी ठेवतो. असो.

इंद्रायणीचा काठच सुपीक! जिथे तिच्या काठावर शेती, मळे बागबगीचे फुलले; तिथेच, त्याच काठावर विठ्ठल भक्तीचेही मळे फुलले. एक मळा फुलवला ज्ञानोबा माउलींनी आणि दुसरा तुकोबांनी. या मळ्यामध्ये विठ्ठल भक्तीचे अमाप पीक आले. आणि अवघ्या महाराष्ट्रातील जनता येथून विठ्ठल भक्तीचे बीज नेऊ लागली तरी ते कमी न होता उलट वाढतच गेले. इंद्रायणीच्या काठीच भागवत धर्माचा पाया रचला गेला. एकाने पाया रचला आणि दुसऱ्याने कळस.

ज्ञानदेवे रचिला पाया, तुका झालासे कळस.

दोघाही संतांच्या शिकवणुकीत विलक्षण साम्य. दोघानाही समाजातील दांभिकतेची चीड. दोघानाही सर्वसामान्यांच्या उद्धाराची तळमळ. भागवत धर्माच्या रत्नजडीत मुकुटात हे दोन अमुल्य हिरे जडवलेले आहेत. समाजातले वाईट, अमंगल नष्ट व्हावे हीच आस या दोघांच्या मनी. असे करताना समाजातील वाईट, दुष्ट व्यक्ती नष्ट होऊ नये तर त्यांची दुष्ट वृत्ती नष्ट व्हावी म्हणून दोघेही प्रयत्नशील. ज्ञानोबा आपल्या पसायदानात म्हणतात-

जे खळांचीची व्यंकटी सांडो, तया सत्कर्मी रती वाढो

भूता परस्परे पडो, मैत्र जीवांचे ।।

आणि तुकोबाराय म्हणतात,

.. मेणाहुनी मऊ आम्ही विष्णुदास, कठीण वज्रास भेदू ऐसे.

… भले तरी देऊ कासेची लंगोटी, नाठाळाचे माथी हाणू काठी.

अशा या सर्व संतांच्या शिकवणुकीत साम्य आहे. असे म्हणतात की परमेश्वराला सर्वत्र जाता येत नाही, म्हणून त्याने आई निर्मिली. तसेच मी म्हणेन की परमेश्वराला सर्वाना समजावणे शक्य नव्हते, म्हणून त्याने संतांची निर्मिती केली. सर्व संतांचे हृदय हे आईचेच हृदय. मातेच्या ममतेने संतांनी समाजाचे पालन पोषण केले. माता प्रसंगी बालकाला रागावतेही पण ते त्याच्या हितासाठी. तसे तुकोबा कधी कधी कठोर झाले. पण ते समाजातील अंधश्रद्धा, रूढी, दुष्ट चालीरीती यावर प्रहार करताना. आणि त्या काळात अशा प्रकारे लोकांना समजावून सांगण्याची आवश्यकता होती. लोक आपले कर्तव्य विसरले होते, गुलामगिरीची वृत्ती अंगी भिनली होती, ढोंगीपणा, बुवाबाजी यासारख्या गोष्टीना ऊत आला होता. लोक देवाची खरी भक्ती विसरले होते आणि नवस सायास करू लागले होते. अशा वेळी ‘ नवसे पुत्र होती, तरी का करणे लागे पती ‘ यासारखे परखड बोल तुकोबांनीच समाजाला ऐकवले. दांभिकतेवर प्रहर करताना ते म्हणतात-

… कथा करोनिया दावी प्रेमकळा, अंतरी जिव्हाळा कुकर्माचा

… तुळसी खोवी कानी दर्भ खोवी शेंडी, लतिका धरी बोंडी नासिकाची

… टिळे टोपी माळा देवाचे गबाळे, वागवी ओंगळे पोटासाठी

… गोसाव्याच्या रूपे हेरी परनारी, तयाचे अंतरी कामलोभ

… कीर्तनाचे वेळी रडे, पडे, लोळे, प्रेमेविण डोळे गळताती

… तुका म्हणे ऐसे भाषेचे महंत, त्यापाशी गोविंद नाही नाही.

तुकोबांची दुसरी पत्नी आवली. कजाग आणि कर्कश मावली. आणि तुकोबा विठ्ठल भक्त. एवढेच आम्ही जाणतो फक्त. पण खरे म्हणजे असे नव्हते. आवली असेल कजाग आणि कर्कश पण तुकोबांवर तिचे अतिशय प्रेम. म्हणतात ना ज्या व्यक्तीवर आपले प्रेम असते त्या व्यक्तीवरच आपण रागावतो. ते जेवल्याशिवाय ती तोंडात अन्नाचा कणही घेत नसे. आणि तुकोबांची योग्यता ती जाणून होती.

घरामध्ये खायला काही नसायचे. मुलेबाळे, पत्नी उपाशी. अशा परिस्थितीत एखाद्याला आपल्या संसारासाठी थोडा स्वार्थ सुचला असता तर ते क्षम्यच होते. पण तुकोबांनी त्यांच्याकडे चालून येणारा नजराणा नाकारला. शिवरायांनी त्यांच्याबद्दल अतीव आदराने तो पाठवला होता. पण ‘ काय उणे आम्हां विठोबाचे पायी ‘ या भावनेतून तो नम्रपणे नाकारला. त्यांनी त्या नजराण्यावर तुळशीपत्र ठेवले आणि म्हटले-

सोने आणि माती, आम्हा समान हे चित्ती

तुका म्हणे आले, घरी वैकुंठ सगळे.

आणि त्यांनी त्या नजराणा घेऊन आलेल्या सरदारांबरोबर निरोप पाठवला, ‘ शिवाजीराजांना सांगा! तुम्ही स्वतः आमच्याहून थोर आहात. तुम्ही आहात म्हणून देहू गावावर परचक्र आलेले नाही. हाच नजराणा मोलाचा. आम्हाला द्रव्य काय करायचे? आम्हाला काय उणे आहे?

असे हे निरिच्छ तुकोबाराय. त्यांचे अभंग तरले कारण ते खऱ्या अर्थाने ‘अ-भंग’ होते. काळाच्या कसोटीवरही ते टिकून राहिले. ते अजरामर आहेत आणि राहतील. वर्षानुवर्षे समाजाला मार्गदर्शन करीत राहतील.

© श्री विश्वास देशपांडे

चाळीसगाव

प्रतिक्रियेसाठी ९४०३७४९९३२

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares