मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ आई-वडिलांनी ठेवलेली मौल्यवान ठेव… – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – सुचिता पंडित ☆

सुचिता पंडित

? वाचताना वेचलेले ?

आई-वडिलांनी ठेवलेली मौल्यवान ठेव… – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती –  सुचिता पंडित ☆

भाऊ-बहिणी म्हणजे केवळ नातं नसतं…

त्या आपल्या आई-वडिलांनी आपल्यासाठी जपून ठेवलेल्या सर्वांत मौल्यवान ठेवी आहेत. याची आपल्याला फार उशिरा जाणीव होते. फक्त सख्खी भावंडं नाहीत तर चुलत, मावस, मामे, आत्ते सर्व भावंडांसाठी हे खरं आहे.

आम्ही लहान असताना भाऊ-बहिणी आमचे सर्वात जवळचे सवंगडी होते. दररोज, आम्ही एकत्र खेळत होतो आणि गोंधळ घालत होतो आणि बालपणीचा काळ एकत्र घालवत होतो. आयुष्यात पुढे जाऊन आम्ही एकमेकांपासून दूर जाऊ… अशी पुसटशीसुद्धा कल्पना आमच्या मनाला कधी शिवली नाही.

मोठे होत गेलो तसे आयुष्याला पंख फुटले…

स्वतःचे वेगळे जीवन सुरू झाले, आपापल्या संसारात रमलो, जबाबदाऱ्यांच्या गर्दीत हरवून गेलो. दिवस, महिने, वर्षं सरकत गेली आणि कधी नकळतच भाऊ-बहिणींच्या भेटी ‘कधीतरी’ या शब्दात अडकून राहिल्या.

आज आम्ही क्वचितच भेटतो, पण मनातल्या आठवणी मात्र अजूनही रोजच भेटायला येतात…

आमचे आई-वडील हा एकमेव दुवा होता, ज्याने आम्हा सर्वांना जोडले.

ज्यांच्या प्रेमाच्या एका धाग्याने आम्हा सगळ्या भावंडांना एकत्र बांधून ठेवलं होतं.

नंतर मात्र आपण वेळेची वाटच पाहत राहतो… हळूहळू म्हातारे होईपर्यंत. तेव्हाच लक्षात येतं की आई-वडील आपल्याला सोडून गेले आहेत, आणि आजूबाजूची नाती एकेक करत कमी होत चालली आहेत आणि नेमकं तेव्हाच आयुष्याच्या संध्याकाळी आपल्याला हळूहळू मायेची किंमत कळायला लागते.

मी नुकताच इंटरनेटवर एक व्हिडिओ पाहिला, ज्यामध्ये १०१ वर्षांचा मोठा भाऊ त्याच्या ९६ वर्षांच्या धाकट्या बहिणीला भेटायला गेला होता. दोघांमध्ये शब्द कमी पण भावना अनावर झाल्या होत्या. थोड्या वेळानंतर जेव्हा दोघे वेगळे होणार होते, तेव्हा धाकट्या बहिणीने कारचा पाठलाग केला आणि तिच्या भावाला २०० युआन दिले आणि त्याला काहीतरी छान खाण्यास सांगितले. तिचे बोलणे पूर्ण होण्याआधीच दोघांनाही अश्रू अनावर झाले. ते दृश्य बघताना शेवटी असं वाटतं… जणू ते भाऊ बहीण मनोमन एकमेकांना हेच आश्वासन देत असावेत की कदाचित ह्या जन्मात पुन्हा भेट नाहीच झाली, तर पुढच्या जन्मात मात्र आपण नक्कीच एकमेकांना भेटू…

असे काही नेटिझन्स होते, ज्यांनी टिप्पणी केली की एवढ्या मोठ्या वयात भाऊ आणि बहिणी भेटणे खरोखरच खूप भाग्याचे लक्षण आहे.

होय, आपण म्हातारे झाल्यावरच आपल्याला कळते की या जगात आपल्याशी कोणीतरी रक्ताने बांधलेलं असणे किती महत्त्वाचे आहे. तेव्हा संपत्ती, मान-सन्मान, यश सगळं मागे पडतं.

जेव्हा तुम्ही म्हातारे असाल आणि तुमचे आई-वडील दोघेही या जगातून निघून गेलेले असतील, तेव्हा या विशाल, गर्दीच्या जगात तुमचे भाऊ बहिणीच सर्वात जवळचे लोक असतात.

मित्र काळाच्या ओघात दूर जाऊ शकतात… मुलं मोठी होतात… तीही आपापल्या विश्वात रमून दूर निघून जातात. पण आयुष्याच्या संध्याकाळी, जेव्हा हाताला हात हवा असतो, तेव्हा खर्‍या अर्थाने साथ देत उरतात ते फक्त दोनच आधारस्तंभ —

तुमचा जीवनसाथी आणि तुमचे बहीण-भाऊ…

आपण कितीही म्हातारे झालो, तरी सर्व भाऊ-बहिणी एकत्र जमू शकणे हा एक मोठा आनंद आहे.

त्यांच्या सहवासात वयाचं ओझंही हलकं होतं आणि आयुष्याच्या संध्याकाळी मनाला उबदारपणाची कधीच कमतरता भासणार नाही.

त्यांच्या सहवासात आम्ही कोणत्याही अडचणींना घाबरणार नाही. म्हणूनच, वृद्धापकाळ येण्याआधीच…

कृपया, आपल्या भाऊ आणि बहिणींशी जुळवून घ्या, नाती जपा! कारण ही रक्ताची नातीच शेवटपर्यंत साथ देतात.

भूतकाळात काहीही अप्रिय घडलं असलं तरीही… भाऊ बहिणींनी एकमेकांशी अधिक सहनशील, अधिक समजूतदार आणि अधिक क्षमाशील असले पाहिजे.

अशी कोणतीही गाठ नाही, जी भाऊ बहिणीच्या नात्यात बांधता येत नाही.

अशी कोणतीही ढाल नाही, जी भाऊ बहिणीच्या नात्यातून काढली जाऊ शकत नाही.

भाऊ बहिणींनी कधीही जुने हिशेब मांडू नयेत, कधीही जुनी नाराजी मनात बाळगू नये.

थोडे अधिक परस्पर अवलंबित्व, थोडं अधिक परस्पर पालनपोषणाने भाऊ बहिणीचे संबंध दिवसेंदिवस अधिक चांगले आणि अधिक घट्ट होतील… कारण या जगात, आपल्या आई-वडिलांनी आपल्यासाठी ठेवलेली ही सर्व नातीच सर्वात मौल्यवान ठेवी आहेत.

 

 शेवटचा प्रश्न…

 एकुलते एक मुलं lucky की lonely?

 आपल्या सोयीसाठी आजची पिढी स्वातंत्र्य, करिअर, आर्थिक सुरक्षितता, आरामदायी जीवन यांचा विचार करते…

 परंतु भविष्यातील माणसं जगात येऊ न देणं… हे खरंच योग्य आहे का…?

 समाज हळूहळू एकाकी, स्वार्थी आणि नात्यांपासून दूर जात तर नाही ना?

 मुलं म्हणजे आपल्या जीवनाचा पुढचा अध्याय.

 पण कधी शांतपणे आपण स्वतःला विचारतो का?

 आपल्या मुलाच्या आयुष्यभराच्या एकटेपणाचा हिशोब आपण भरू शकणार आहोत का?

 आपण मागे काय सोडून जाणार आहोत?

 आपण ज्या Western world ची आंधळी नक्कल करतो, तोच पश्चिमेकडचा समाज आज पुन्हा ४–५ मुलांना जन्म देण्याकडे वळतोय.

 कारण त्यांनी अनुभवलेय –

मोठी घरे, प्रचंड पैसा, प्रगत सुविधा असूनही त्यांच्या मुलांचं आयुष्य एकाकी, नैराश्यग्रस्त आणि संस्कृतिहीन होत चाललं आहे.

 ते आता म्हणतात —

“We lost families in the race for freedom. ”

 आपण इथे आहोत, कारण कुणीतरी आपल्याला जन्म देण्याचं धाडस केलं.

हजारो वर्षे आपल्या पूर्वजांनी दुष्काळ, रोगराई, युद्ध, गरीबी, अपमान, कष्ट अशा कितीतरी संकटांना तोंड देऊन आपल्याला जगवले.

आज काही जोडपी जाणीवपूर्वक “मुलंच नको” असा निर्णय घेत आहेत.

पण हा निर्णय फक्त त्या दोन व्यक्तींचा नसतो…

तो परिणाम करतो सर्व समाजावर, आपल्या गौरवशाली संस्कृतीवर आणि येऊ घातलेल्या अनेक पिढ्यांवर…

कृपया आजच्या आपल्या संस्कृतीच्या शिलेदारांनी शांत मनाने सारासार विचार जरूर करावा…

 

लेखक:अज्ञात

प्रस्तुती: सुचिता पंडित

 ≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ “गृहिणीपणाचा उत्सव -चैत्रगौर” – लेखक : श्री विनय मधुकर जोशी ☆ शोभा जोशी ☆

शोभा जोशी 

? वाचताना वेचलेले ?

☆ “गृहिणीपणाचा उत्सव -चैत्रगौर” – लेखक : श्री विनय मधुकर जोशी ☆ शोभा जोशी ☆

चैत्र शुद्ध तृतीया म्हणजे गौरी तृतीया. या तारखेपासून वैशाख शुक्ल तृतीयेपर्यंत गौरीची पूजा करून महिनाभर हा उत्सव साजरा होतो. देवघरातली अन्नपूर्णा लख्ख करून तिची षोडशोपचारे पूजा केली जाते आणि तिला महिनाभर झोपाळ्यावर ठेऊन हा उत्सव साजरा होतो. अनेक शुभ चिन्हांची रांगोळी ‘चैत्रांगण’ काढली जाते.

गौरी अन्नपूर्णा कशी झाली याची सुंदर कथा पुराणात येते. गौरी ही भौतिक समृद्धीची देवता. अन्नधान्य, वात्सल्य, धन संपत्ती, सौंदर्य, मांगल्य, कौटुंबिक सौख्य ही सारी काही तिचीच कृपा. आणि शिव म्हणजे विशुद्ध ज्ञान! . योग, वैराग्य, ब्रह्मज्ञान यांचे ते अधिष्ठान.

शिव-पार्वती एकदा कैलाशी निवांत गप्पा मारत होते. बोलण्याच्या ओघात शिव म्हणाले, “ब्रह्म सत्यम जगत मिथ्या. फक्त ब्रह्म सत्य आहे बाकी सब झूट. “

 

पार्वती म्हणाली, “अहो हे सुंदर विश्व? “

शिव म्हणाले, “साफ खोटं, आभासी आहे हे. “

“विश्वातील सौंदर्य, मांगल्य, नातीगोती?

तेही असत्य?

बरं. मग आपण खातो ते अन्न तरी? “

“तेही खोटं, असत्य, आभासीच, फक्त ब्रह्मतत्त्व सत्य! “

 

झालं …. गौरीला आला थोडा राग. ती म्हणाली, “बरं तुमचं ज्ञान वैराग्यच खरं. बाकी सगळं आभासी ना? या क्षणी मी अंतर्धान होते. “

गौरी गुप्त होताच जगातले मांगल्य लोपले, नात्यांचा गोडवा उडाला, घराचे घरपण हरपले, सात्त्विक सौंदर्य विरले, आणि मुख्य म्हणजे जगातले सगळे अन्नधान्यसुद्धा अकस्मात संपले.

 

शिवांना वाटले, हरकत नाही. या वाचून जगाचे काही बिघडत नाही. पण थोड्याच वेळात अख्ख्या जगातले देव, मानव, ऋषी, पशुपक्षी, सारे प्राणीमात्र भुकेले होऊन शिवांपाशी आले.

महादेव म्हणाले, “थांबा. तुम्हाला जरा ज्ञान देतो. ” पण भुकेल्या पोटी कसलं ब्रह्म? कसलं ज्ञान?

“आधी अन्न द्या. मग पुढचं बोला. “

पण अन्न आणायचे कुठून. कोणीतरी सांगितलं, ” संपूर्ण विश्वात फक्त काशी नगरीत एक घर आहे. तिथेच अन्न उपलब्ध आहे. सगळ्या प्राणिमात्रांच्या वतीने शिव याचक म्हणून तिथे भिक्षा मागायला गेले.

“ओम भवति भिक्षां देही|”

आतून एका गृहिणीचा नाजूक आवाज आला, ” महादेवा, भिक्षेत काय देऊ? ज्ञान की वैराग्य?

महादेवांनी पाहिलं, आत सुवर्ण सिंहासनी साक्षात पार्वती बसली आहे, मांगल्य लेवून, पावित्र्य पांघरून, समृद्धीचे अलंकार घालून आणि तिच्या हातात आहे अन्नाचे अक्षयपात्र, वात्सल्याच्या पळीने ती प्रत्येक जिवाला अन्न देऊन तृप्त करते आहे.

प्रपंचाशिवाय परमार्थ, प्रवृत्तीवाचून निवृत्ती, शक्तीविना शिव अपूर्णच आहेत हा साक्षात्कार शिवांना झाला. शिव म्हणाले, “ज्ञान -वैराग्य प्राप्त होण्यासाठी आधी शरीरात शक्ती आणि मनात शांती हवी. त्यासाठी सकस अन्न हवे. अन्न हे पूर्णब्रह्म. त्याचीच भिक्षा दे!

ज्ञान वैराग्य सिद्ध्यर्थं भिक्षां देहि च पार्वती ।।”

पार्वती हसली. तिने आनंदाने शिवांना भोजन दिले. शिव तृप्त होताच जगातले सगळे जीवदेखील तृप्त झाले.

त्या तृप्त अंतकरणाने महादेव म्हणाले, ” तू सदाशिवालासुद्धा पूर्ण करणारी सदापूर्णा आहेस. जगाची आई बनून अन्न पुरवणारी तू अन्नपूर्णा आहेस. “साध्या गृहिणीच्या रूपातली ती शंकराची प्राणवल्लभा अन्नपूर्णा म्हणून विख्यात झाली.

ही अन्नपूर्णा जगातल्या सगळ्या गृहिणींचं प्रतीक आहे. सोनेरी महालात राहणाऱ्या रुख्मिणीवरदेखील द्वारकेतील सगळ्यांना अन्न देण्याची जबाबदारी होती आणि झोपडीत राहणारी सुदामाची बायकोसुद्धा मिळेल ते रांधून घराला जेवू घालत होती. परिस्थितीचा फरक असेल, पण कुटुंबाला तृप्त करण्याची वृत्ती सारखीच आहे. कदाचित ही आठवण राहावी म्हणून नववधूला लग्नात माहेरून अन्नपूर्णा देतात. तिची रोज पूजा करत गृहिणीने सकस अन्न शिजवावं, नाती जपावीत, घराला घरपण द्यावं. हे सगळं करत असताना “गृहिणी कुठे काय करते? ” असा प्रश्न कोणी विचारला तर गृहिणीच्या रुपात अवतीर्ण होऊन जगाचे पोषण करणाऱ्या अन्नपूर्णेची कथा आठवावी.

या गृहिणीपणाचा उत्सव ही चैत्रगौर. रोजची देवघरातली अन्नपूर्णा मखरात हिंदोळ्यात बसवली जाते. किंवा काही ठिकाणी पंचगौरचे छोटे झोपाळे पुजले जातात. त्यात मध्यभागी ही गौरी आणि सभोवताली तिचा परिवार -शिव, गणेश, नंदी वगैरे. गृहिणी हीच घराचा केंद्रबिंदू आहे हे यातून बिंबवलं जातं.

स्वयं पञ्चाननः पुत्रौ गजाननषडाननौ।

दिगम्बरः कथं जीवेदन्नपूर्णा न चेद्गृहे॥

पाच मुखे असणारे शंकर; गजमुख गणेश आणि सहा मुख असणारा कार्तिकेय अशी खाणारी बारा तोंडे घरी असताना भिक्षाटन करणाऱ्या दिगंबर शिवाचा संसार सुरळीत चालला आहे; कारण त्याच्या घरी अन्नपूर्णा गृहिणी म्हणून आहे.

शिवांपासून तर जगभरातल्या सगळ्यांचे संसार ज्यांच्यामुळे सुरळीत चालले आहेत अशा गृहिणींच्या रुपात असणाऱ्या अन्नपूर्णेला नमन

अन्नपूर्णे सदापूर्णे शंकरः प्राणवल्लभे ।

ज्ञान वैराग्य सिद्ध्यर्थं भिक्षां देहि च पार्वती ।।

लेखक: श्री विनय मधुकर जोशी

प्रस्तुती : शोभा जोशी

कार्यकर्ती, जनजाती कल्याण आश्रम, पुणे महानगर. 

मो ९४२२३१९९६२ 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ “श्री एकनाथ महाराजांचे एक भारुड” – लेखक – अज्ञात ☆ प्रस्तुती – श्री अनिल वामोरकर ☆

श्री अनिल वामोरकर

📖 वाचताना वेचलेले  📖

☆ “श्री एकनाथ महाराजांचे एक भारुड” – लेखक – अज्ञात ☆ प्रस्तुती – श्री अनिल वामोरकर ☆

श्री एकनाथ महाराजांचे एक भारूड – निरुपणासह:

चिंचेच्या पानावर देऊळ रचिले,

आधी कळसू मग पाया रे ।

देव पुजू गेले तव देऊळ उडाले,

खेळिया सद्गुरुराया रे ।

पाषाणाची सांगड मृगजळ डोही,

वांझेचा पुत्र पोहला रे ।

दुहीतोंडी हरणी पाणी पिण्या आली,

मुखाविण पाणी प्याली रे ।

आंधळ्याने देखिले, बहिऱ्याने ऐकिले,

पांगळ्याने पाठलाग केला रे ।

एकाजनार्दनी एकपणे विनवी,

हरिच्या नामे तरलो रे ।।

 अर्थ:

चिंचेच्या पानाइतके छोटेसे असे आईचे उदर. त्या उदरात देऊळ म्हणजे नरदेह, त्याची रचना परमेश्वर करतो. हा नरदेह चिंचेच्या पानावर म्हणजे आईच्या उदरात रचला जात असताना, आधी डोके तयार होते. प्रथम मस्तकाची निर्मिती केली जाते व मग इतर अवयव हळूहळू निर्माण होऊ लागतात म्हणून आधी कळस म्हणजे मस्तक आणि मग पाया म्हणजे इतर सर्व अवयव अशी या तुमच्या आमच्या नरदेहरुपी देवळाची रचना आईच्या उदरात म्हणजेच चिंचेच्या पानावर होते असे एकनाथ महाराज सांगतात.

पुढे ते म्हणतात की, बालपण खेळण्यात व तरुणपण कामात निघून जाते. या देवळामध्ये म्हणजे माझ्या नरदेहात देव आहे हे कळून तो पाहायला जाईपर्यंत देऊळ उडून जायची म्हणजे नरदेहात राहण्याची आपली मुदत संपायची वेळ येते म्हणून तत्पूर्वीच, हा खेळ ज्या सद्गुरुरायाने मांडला आहे त्या सद्गुरुला शरण जाऊन देऊळ उडण्याआधी म्हणजे नरदेह हातून निसटून जाण्याआधीच, सद्गुरुला शरण जावे.

दोन पाषाण एकत्र करून बांधलेली सांगड म्हणजे दोन जड देहांचे मिलन. अर्थात लग्न! ते देहाशी देहाचे लावले जाते. तो देह जड असल्याने त्याला पाषाण असे म्हटलेले आहे आणि या दोन जड देहांचे मिलन म्हणजे पाषाणाची सांगड एकत्र झाल्यावर मृगजळ म्हणजे संसार, खऱ्या अर्थाने सुरू होतो. मृगजळ ज्याप्रमाणे प्रत्यक्षात नसूनही भासते त्याप्रमाणेच संसारही प्रत्यक्षात नसून भासत असतो. या संसाररूपी मृगजळात म्हणजे खोट्या कल्पित संसारात अहंकाररुपी वांझेचा पोर पोहून जातो. म्हणजेच संसारात, सर्व काही मी केले म्हणूनच झाले, माझ्याशिवाय इथले पानही हलत नाही हा जो मनुष्य अहंकार बाळगतो त्याला नाथ महाराज वांझेचा पोर म्हणतात. या अहंकाराला आई किंवा बाप नाहीत. हा अहंकार खोटा आहे म्हणूनच त्याला वांझेचा पोर असे म्हटले आहे आणि तो अहंकार आपल्याला खोट्या खोट्या संसारातून पोहून जायला मदत करतो आहे असे आपल्याला भासते.

पुढे ते म्हणतात, या मृगजळाच्या डोहात, दोन तोंडांची हरणी म्हणजे वासना पाणी प्यायला आली. जरी शरीराकडून प्रत्यक्षात वाईट कृती किंवा विषयांचा उपभोग घेतला गेला नाही, तरी वासना मनाकडून वाईट चिंतन घडवते आणि म्हणूनच मुखाविण पाणी प्याली रे. प्रत्यक्षात एखादी व्यक्ती हरिस्मरण करत असेल, तरीही वासनेला जिंकलेले नसल्यास ती वासना त्याला, शरीराने भजनात रमत असतानाही, मनाने विषयांची गोडी चाखवतेच.

आंधळ्याने पाहिले. आंधळे असते ते आमचे ज्ञान कारण ते आपल्यात सुप्तावस्थेत आहे. सद्गुरूंनी चालना दिल्याशिवाय ते ज्ञान डोळस, दिव्य होऊ शकत नाही म्हणून आंधळा असलेला जीवही पाहू लागतो म्हणजे ज्ञानही डोळस बनते जर सद्गुरुला शरण गेलो तर. बहिऱ्याने ऐकिले बहिरा म्हणजे ज्याला कान नाहीत तो.

याबाबतीत पुराण काळातील महादेवांनी पार्वतीला मंत्र दिल्याची गोष्ट उदाहरणादाखल घेता येईल. त्यांनी जेव्हा गुह्य ज्ञान तिला एकांतात बसून सांगितले तेव्हा ते सांगत असताना त्यांना सतत हुंकार ऐकू येत होता. ज्ञान देऊन झाल्यावर त्यांनी डोळे उघडून पाहिले तर पार्वती झोपली होती. मग इतका वेळ हुंकार कोण देत होते, याचा शोध केल्यावर एका मासळीच्या पोटातील गर्भाने ते ज्ञान ऐकताना हुंकार दिल्याचे कळले व त्या मासळीचे पोट फाडल्यावर मच्छिंद्रनाथांचा जन्म झाला म्हणून आदिनाथ हे मच्छिंद्रनाथांचे गुरु म्हणून ओळखले जातात. आता, मासळीचे शरीर पाहिल्यास त्या शरीराला कान हा अवयव नसल्याचे आढळते. तिथे फक्त स्पर्श ज्ञान आहे. मग तरीही मासळीच्या पोटातील गर्भाने ते गुह्य ज्ञान ऐकून हुंकार द्यावा याचाच अर्थ आत्मज्ञान प्राप्तीसाठी बाहेरील कान या अवयवाची गरज नसून सर्वांगाचे कान करून एकचित्ताने ते ज्ञान ऐकणे इथे अभिप्रेत असावे असे वाटते म्हणून बहिऱ्याने ऐकिले. याचाच अर्थ बाकी सगळीकडचे चित्त काढून, सर्वांगाचे कान करून, गुरूंनी दिलेला मंत्र, गुह्य ज्ञान ऐकणे हा अर्थ नाथांना अभिप्रेत असावा असे वाटते. शिष्य कितीही बहिरा असला म्हणजे आत्मज्ञान ऐकण्याच्या तयारीचा नसला, तरी सांगणारा गुरु जर ब्रह्मनिष्ठ व श्रोत्रीय मिळाला तर बहिराही ऐकू शकतो म्हणजे त्याच्याकडूनही उत्तम श्रवण घडते. पांगळ्याने पाठलाग केला रे. इथे पांगळे आहे ते आमचे मन कारण मनाला पाय हा अवयव नाही. पण तरीही ते आमच्या पायांपेक्षा कितीतरी जलद गतीने, कुठेही, केव्हाही जाऊ शकते म्हणून पांगळे म्हणजे मन ते या गुरुवचनाचा पाठलाग करू लागते आणि म्हणूनच नाथ महाराज म्हणतात की, जनार्दन स्वामींच्या कृपेने, जी अनुभूती मला मिळाली, त्यावरून मी सांगतो की, जरी तुमच्याजवळ अहंकार असेल, वासना असेल, ज्ञान आहे पण ते सदोष आहे, किंवा आंधळे आहे, दिव्य ज्ञान नाही, गुरूंचा बोध ऐकण्याची उत्सुकता नाही, मन सैरावैरा विषयांकडे धावत आहे. अशा सर्व परिस्थितीतही जर गुरूंनी दिलेले नाम जवळ बाळगले तर तुम्ही नक्की तरून जाल. गुरुकडून हरिनाम मला मिळाले, त्या हरिनामामुळेच मी तरून गेलो म्हणून मी एकपणाने तुम्हाला विनवित आहे की, एकचित्ताने सर्वांनी नाम घ्या आणि देऊळ उडण्याआधीच त्या देवळातील देवाची ओळख करून घ्या.

।। श्री राम जय राम जय जय राम।।

 लेखक : अज्ञात

प्रस्तुती – श्री अनिल वामोरकर

अमरावती

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ पहारा… – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – प्रफुल्ला शेणॉय ☆

प्रफुल्ला शेणॉय

📖 वाचताना वेचलेले 📖

☆ पहारा… – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – प्रफुल्ला शेणॉय ☆

कोल्हापूर ते पणजी या मार्गावर आंबोली घाटातून जाणारी लाल रंगाची ‘एसटी बस’ सर्वांनाच परिचयाची होती. या बसचे जुने ड्रायव्हर होते, ‘माधवराव’. गेली तीस वर्षे त्यांनी हा अत्यंत धोकादायक आणि वळणावळणाचा घाट निर्धोकपणे पार केला होता. माधवराव अतिशय शांत आणि मितभाषी होते.

पण माधवरावांची एक विचित्र सवय होती, जिचा प्रवाशांना भयंकर कंटाळा यायचा. घाटाच्या अगदी मध्यभागी ‘काळभैरव वळण’ नावाचे एक अत्यंत धोकादायक आणि अंधारे वळण होते. तिथे आजूबाजूला काहीही नव्हते, फक्त शेकडो फूट खोल दरी होती. माधवराव रोज न चुकता स्वतःची एसटी बस त्या वळणावर ‘दोन मिनिटांसाठी’ थांबवायचे. ते एसटीतून खाली उतरायचे, दरीच्या कठड्याजवळ जाऊन त्या खोल अंधाऱ्या दरीत काहीतरी निरखून पाहायचे, आणि मग परत येऊन गाडी सुरू करायचे.

एके दिवशी या बसमधून रोहन नावाचा एक तरुण प्रवास करत होता. रोहनला स्वतःच्या सोशल मीडिया पेजवर ‘व्हायरल’ व्हिडिओ टाकण्याचे भयंकर व्यसन होते. त्याला पुण्यात एका महत्त्वाच्या मीटिंगला जायचे होते आणि बस आधीच लेट होती.

जेव्हा माधवरावांनी नेहमीप्रमाणे त्या निर्जन दरीजवळ गाडी थांबवली आणि ते खाली उतरले, तेव्हा रोहनच्या रागाचा स्फोट झाला. त्याने स्वतःचा मोबाईल काढला आणि माधवरावांचा व्हिडिओ रेकॉर्ड करायला सुरुवात केली.

“बघा मित्रांनो, हा म्हातारा ड्रायव्हर रोज या निर्जन दरीजवळ गाडी थांबवून प्रवाशांचा वेळ वाया घालवतोय. नक्कीच हा इथे काहीतरी जादूटोणा किंवा अंधश्रद्धेचे प्रकार करत असावा. अशा बेजबाबदार माणसांमुळेच एसटीचा बोजवारा उडालाय, ” असा स्वतःचा आवाज टाकून रोहनने तो व्हिडिओ इंटरनेटवर व्हायरल करून टाकला.

व्हिडिओ वाऱ्यासारखा पसरला. लोकांच्या संतापजनक कमेंट्स आल्या. एसटी महामंडळावर दबाव आला आणि अधिकाऱ्यांनी माधवरावांना बोलावून त्यांच्यावर ‘कामात हलगर्जीपणा’ केल्याचा ठपका ठेवून त्यांना नोकरीवरून निलंबित (Suspend) केले. त्यांचे पेन्शनही रोखण्यात आले. माधवरावांनी कुणाकडेही कोणतीही तक्रार केली नाही, ते फक्त मान खाली घालून एसटी स्टँडवरून कायमचे निघून गेले. रोहनला मात्र स्वतःच्या ‘व्हायरल’ ताकदीचा भयंकर अहंकार आला होता.

या घटनेला दोन महिने उलटले. मुसळधार पावसाळ्याचे दिवस होते. रोहन स्वतःच्या नवीन कारने रात्री दोन वाजता त्याच आंबोली घाटातून एकटाच पुण्याच्या दिशेने निघाला होता.

पावसाचा जोर भयंकर होता आणि समोरचे काहीच दिसत नव्हते. त्याच ‘काळभैरव वळणावर’ रोहनच्या गाडीचा ब्रेक स्लिप झाला. गाडीने कठडा तोडला आणि ती कार सपकन त्या शेकडो फूट खोल, अंधाऱ्या दरीत कोसळली.

गाडी झाडांमध्ये अडकून उलटी पडली होती. रोहन रक्ताच्या थारोळ्यात अडकला होता. त्याच्या छातीत स्टिअरिंग घुसलं होतं. रात्रीचे अडीच वाजले होते, मुसळधार पाऊस सुरू होता आणि मुख्य रस्त्यावरून त्याची गाडी दरीत पडलेली कुणालाही दिसण्याची सुतराम शक्यता नव्हती. “आपण आता मरणार, आपल्याला कुणीच वाचवू शकत नाही, ” या भीतीने रोहनच्या डोळ्यांसमोर अंधारी येऊ लागली. त्याचा श्वास कोंडत होता.

तेवढ्यात… त्या घनदाट अंधारात आणि पावसात दरीच्या वरून एका बॅटरीचा (Torch) प्रकाश त्याच्या गाडीवर पडला. कुणीतरी भिजत, चिखलातून घसरत एका जाड दोरीच्या साहाय्याने खाली दरीत उतरत होते.

तो माणूस गाडीजवळ आला. त्याने स्वतःच्या जिवाची पर्वा न करता, रक्ताने माखलेल्या रोहनला गाडीतून अत्यंत कष्टाने बाहेर ओढले. त्या म्हाताऱ्याने रोहनला स्वतःच्या पाठीवर घेतले आणि चिखलातून, दगडांमधून रक्ताळलेल्या अवस्थेत त्याला खेचत वर रस्त्यावर आणले. रोहन बेशुद्ध पडला.

दुसऱ्या दिवशी सकाळी हॉस्पिटलमध्ये रोहनला शुद्ध आली. त्याच्या बेडशेजारी एक पोलीस इन्स्पेक्टर उभे होते.

“नशीबवान आहेस तू मित्रा. जर काल रात्री ‘माधवरावां’नी तुला दरीतून बाहेर काढलं नसतं, तर आज तुझा मृतदेहच सडला असता तिथे, ” इन्स्पेक्टर म्हणाले.

‘माधवराव? ‘ हे नाव ऐकताच रोहनच्या काळजाचा ठोका चुकला. त्याने थरथरत्या आवाजात विचारले, “मा… माधवराव? ते एसटी ड्रायव्हर? पण ते रात्री अडीच वाजता त्या दरीजवळ काय करत होते? “

इन्स्पेक्टरने एक दीर्घ श्वास घेतला आणि जे सत्य सांगितले, ते ऐकून रोहनच्या पायाखालची जमीनच फाटली.

“तुला माहितीये, ते म्हातारे माधवराव रोज एसटी थांबवून त्या दरीत काय बघायचे? पंधरा वर्षांपूर्वी, माधवरावांची गरोदर मुलगी आणि जावई त्याच काळभैरव वळणावरून रात्री दरीत कोसळले होते. ते दोघेही सलग सहा तास त्या दरीत जिवंत होते, मदतीसाठी ओरडत होते… पण रस्त्यावरून जाणाऱ्या एकाही गाडीने खाली दरीत डोकावून पाहिलं नाही. ते तडफडून तिथेच मेले. त्या दिवसापासून माधवरावांनी एक शपथ घेतली होती… की त्यांची एसटी जेव्हाही त्या वळणावरून जाईल, तेव्हा ते दोन मिनिटे थांबून दरीत नक्की डोकावून पाहतील, जेणेकरून आणखी कुणाचं बाळ तिथे तडफडून मरु नये. ते प्रवाशांचा वेळ वाया घालवत नव्हते रोहन… ते त्या दरीचा पहारा देत होते! “

रोहनच्या डोक्याला भयंकर मुंग्या येऊ लागल्या. त्याला श्वास घेता येईना.

“तू व्हिडिओ व्हायरल करून त्यांची नोकरी खाल्लीस. त्यांची एसटीची ड्युटी गेली… पण त्या म्हाताऱ्याचा नियम मोडला नाही. नोकरी गेल्यापासून गेल्या दोन महिन्यांत ते म्हातारे रोज रात्री पावसात, स्वतःच्या गावातून पाच किलोमीटर अनवाणी चालत त्या दरीजवळ येतात आणि हातात बॅटरी घेऊन कुणी पडलंय का ते चेक करतात. काल रात्री ते तिथेच उभे होते, म्हणून तू वाचलास. तुला वाचवताना त्यांच्या डोक्याला मार लागलाय आणि ते बाहेरच्या वॉर्डमध्ये बेशुद्ध आहेत.”

रोहनच्या हातातील सलाईनची नळी निसटली. तो बेडवरून खाली फरशीवर गुडघ्यावर कोसळला.

ज्या म्हाताऱ्याला त्याने स्वतःच्या एका ‘व्हायरल’ व्हिडिओसाठी आणि अहंकारासाठी नोकरीवरून काढले होते, ज्याची त्याने संपूर्ण जगासमोर बदनामी केली होती… त्या देवासमान म्हाताऱ्याने स्वतःच्या मुलीचे दुःख विसरून, नोकरी गेल्यानंतरही भर पावसात दरीचा पहारा दिला होता, आणि त्याच म्हाताऱ्याने रोहनला मृत्यूच्या दाढेतून खेचून आणले होते! खोट्या प्रसिद्धीचा आणि सोशल मीडियाचा तो सगळा अहंकार आज त्या म्हाताऱ्याच्या रक्ताळलेल्या पायांसमोर कायमचा राख झाला होता. रोहन वेड्यासारखा दोन्ही हातांनी स्वतःचे तोंड दाबून ओक्साबोक्शी रडत होता. स्वतःच्याच नीचपणाची आणि माधवरावांच्या त्या हिमालयाएवढ्या निस्वार्थ त्यागाची जाणीव इतकी भयंकर होती की, तो तिथेच एका जिवंत प्रेतासारखा थिजून गेला.

आपल्याला जे सत्य ‘स्क्रीनवर’ दिसते, ते नेहमीच खरे नसते. एखाद्याच्या वागण्यामागची नेमकी वेदना समजून घेतल्याशिवाय त्याला जगासमोर गुन्हेगार ठरवू नका. खऱ्या आयुष्यात ‘व्हायरल’ होण्यापेक्षा ‘माणूस’ होणे जास्त गरजेचे असते, कारण जेव्हा सत्याची चपराक बसते, तेव्हा पश्चात्ताप करायला शब्दही अपुरे पडतात.

लेखक: अज्ञात

प्रस्तुती :  प्रफुल्ला शेणॉय

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ निवांत एकांत… लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – स्वाती मंत्री ☆

स्वाती मंत्री

📖 वाचताना वेचलेले 📖

☆ निवांत एकांत… लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती –  स्वाती मंत्री ☆

मंदिराच्या पायऱ्या चढताना हातातील फुलांच्या हारापेक्षाही मनातील मागण्यांचे ओझे जास्त जड असते..

प्रत्येक पाऊल एका अपेक्षेने पडत असते आणि प्रत्येक नमस्कारात काहीतरी पदरात पाडून घेण्याची धडपड असते..

आपण देवाकडे जातो ते बहुधा स्वतःला अपूर्ण समजूनच..

कुणाला धन हवे असते, कुणाला यश, तर कुणाला केवळ मनाची शांती..

पण या मागणारे आणि देणारे यांच्या गर्दीत एक निराळाच प्रवाह वाहत असतो.

तो म्हणजे त्या जिवांचा, ज्यांनी मागणे सोडून दिले आहे..

ज्यांच्या डोळ्यांत आता आसवांची जागा एका संथ शांततेने घेतली आहे..

​माणूस जेव्हा स्वतःच्याच अंतर्मनाच्या गाभाऱ्यात डोकावतो, तेव्हा त्याला उमजते की खरी श्रीमंती बाहेरून काही मिळवण्यात नसून आत जे आहे त्यात तृप्त राहण्यात आहे.

हे जगणे सोपे नसते..

या तृप्तीला एक सूक्ष्म दुःखाची किनार असते. हे दुःख एखाद्या जुन्या जखमेसारखे नसते, तर ते एका अशा जाणीवेचे असते की आता आपल्याला जगाकडून काहीही नको आहे..

ज्याला काही नको असते, तोच खऱ्या अर्थाने ‘सुखी आत्मा’ असतो..

पण या वैराग्यात एक प्रकारची एकाकीपणाची सावली असते..

जग जेव्हा धावत असते, ओरडत असते, तेव्हा हा माणूस आपल्याच हृदयाच्या कोपऱ्यात शांत बसून स्वतःच्या अस्तित्वाचा उत्सव साजरा करतो..

ही तृप्ती आनंदापेक्षाही जास्त गंभीर आणि मौनापेक्षाही जास्त सखोल असते..

अशा वेळी बाहेरच्या मूर्तीसमोर हात जोडण्याचं भानही उरत नाही, कारण साऱ्या जगाला व्यापणारा तो विधाता स्वतःच्याच निवांत एकांतात सामावलेला असतो..

हे एक नितांत सुंदर सत्य आहे..

*

लेखक: अज्ञात

प्रस्तुती: स्वाती मंत्री

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ रफू… – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – सौ. गौरी गाडेकर ☆

सौ. गौरी गाडेकर

📖 वाचताना वेचलेले 📖

☆ रफू… – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – सौ. गौरी गाडेकर

गावातल्या जुन्या बाजारपेठेत एक छोटंसं दुकान होतं — ‘रफूवाला’.

दुकान इतकं छोटं की आत उभं राहिलं की बाहेरचं जग विसरून जावं.

भिंतीवर टांगलेले जुने कोट, फाटलेल्या शाली, झिजलेले स्वेटर्स… आणि टेबलावर एक छोटं भिंग.

 

दादाभाईचं काम एकच — रफू.

.. .. रफू म्हणजे फक्त सुई-दोऱ्याचं काम नाही.

रफू म्हणजे फाटलेलं इतकं जपून जोडणं की फट कुठे होती हेही दिसू नये.

.. .. पण हे काम सगळ्यांना जमत नाही.

कारण फक्त सुई-दोरा असला म्हणून रफू होत नाही.

त्यासाठी लागतात — वर्षांचा अनुभव, संयम, आणि कपड्याची भाषा समजणारे डोळे.

 

त्या दिवशी दादाभाईच्या दुकानात एक तरुण आला. हातात त्याने एक जुना स्वेटर धरला होता.

“भाई… हे रफू होईल का?”

भाईने भिंग लावून स्वेटर पाहिला. फट मोठी होती.

 

ते शांतपणे म्हणाले, “रफू होईल… पण वेळ लागेल.”

 तरुण थोडा चिडून म्हणाला, “इतका वेळ कशाला? दोन टाके मारले की झालं ना?”

 

भाई हलकंसं हसले.

“बाबा… दोन टाके मारणं म्हणजे शिवण.

पण रफू म्हणजे जखम लपवणं.”

 

 दुकानात एक वृद्ध माणूस बसलेला होता.

तो सगळं ऐकत होता. त्याने हळूच विचारलं ,

“भाई… कपड्याला रफू असतो…

पण नात्यांना असतो का?”

.. .. दुकानात क्षणभर शांतता पसरली.

 

त्या वृद्धाचं नाव होतं दत्ताभाऊ.

त्यांचा एक जिवलग मित्र होता — गणेश.

शाळेत एकत्र, कॉलेजात एकत्र, लग्नात एकमेकांच्या बाजूला.

लोक म्हणायचे,

“हे दोघे मित्र नाहीत…एका आत्म्याचे दोन भाग आहेत.”

 

पण आयुष्यात एक दिवस आला.

व्यवसायात पैसे आले.

पद, प्रतिष्ठा, सत्ता आली.

आणि त्याच्यासोबत आली —

.. .. अहंकाराची बारीक फट.

 

सुरुवातीला ती फट दिसलीच नाही. मग गैरसमज वाढले. एकमेकांवर शब्द झडले.

आणि एक दिवस…

.. .. नातं फाटलं.

 

दत्ताभाऊ हळू आवाजात म्हणाले,

“सुरुवातीला वाटलं… दोन फोन केले की सगळं ठीक होईल. पण अहंकाराचा दोरा खूप घट्ट असतो.”

 

वर्षं गेली.

.. दोघेही आपापल्या आयुष्यात मोठे झाले.

पण आत कुठेतरी एक जागा रिकामी राहिली.

 

भाई शांतपणे रफू करत होते.

ते म्हणाले,

“दत्ताभाऊ… कपडं फाटलं की लोक लगेच आणतात.

पण नातं फाटलं की लोक थांबतात.

अहंकार सुकू देतात… जखम खोल जाऊ देतात… .. आणि मग रफू करायला येतात तेव्हा…”

 

ते स्वेटर उचलून दाखवत म्हणाले,

“दोरा जुळत नाही… रंग जुळत नाही… आणि फट जास्त मोठी झालेली असते.”

 

दत्ताभाऊंच्या डोळ्यात पाणी आलं.

 

ते म्हणाले, “भाई… मग उपाय काय?”

 

भाईने सुई हळूच ठेवली.

.. “उपाय एकच… रफू लवकर करायचा.”

“फट दिसली की लगेच बसायचं.

दोरा संयमाचा, सुई समजुतीची, आणि गाठ माफीची.”

.. .. स्वेटर तयार झाला. फट कुठे होती हे ओळखूही येत नव्हतं.

 

तरुण आश्चर्याने म्हणाला,

“भाई… खरंच दिसत नाही!”

 

दादाभाई म्हणाले,

“कारण मी फक्त टाके मारले नाहीत.

कपड्याच्या धाग्यांतूनच धागा काढून रफू केला.”

 

दत्ताभाऊ उठले. त्यांनी फोन काढला. खूप वर्षांनी एक नंबर डायल केला.

 

फोनच्या दुसऱ्या बाजूने आवाज आला…

“हॅलो…?”

दत्ताभाऊंचा आवाज थरथरला.

“ गण्या, आपल्या मैत्रीला थोडा रफू करायचा आहे. वेळ आहे का?”

 

त्या दिवशी दादाभाई दुकान बंद करताना हळूच पुटपुटले , “कपड्याचा रफू मी करू शकतो. पण नात्यांचा रफू माणसांनी स्वतः करायचा असतो…

कारण –

– – फाटायला एक क्षण लागतो, पण रफू करायला कधी कधी संपूर्ण आयुष्य लागतं.”

लेखक : अज्ञात

प्रस्तुती : गौरी गाडेकr

संपर्क – 1/602, कैरव, जी. ई. लिंक्स, राम मंदिर रोड, गोरेगाव (पश्चिम), मुंबई 400104.

फोन नं. 9820206306

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ मुलगा काय करतो? – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – श्री अमोल अनंत केळकर ☆

श्री अमोल अनंत केळकर

? वाचताना वेचलेले ?

मुलगा काय करतो? – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – श्री अमोल अनंत केळकर ☆ ☆

लग्नाच्या ठरवून केलेल्या भेटीत, मुलगी पाहायला गेल्यावर एक प्रश्न जवळजवळ हमखास विचारला जातो: “मुलगा काय करतो?”

भुराचे कुटुंब त्याच्यासाठी मुलगी पाहायला गेले. चहा-नाश्ता आणि थोड्या गप्पा झाल्यावर, मुलीच्या वडिलांनी हळूच मुख्य विषय काढला: “तर, तुमचा मुलगा सध्या काय काम करतो?”

भुराच्या वडिलांनी चष्मा नीट केला, घसा खाकरला आणि अगदी कॉर्पोरेट स्टाईलमध्ये बोलायला सुरुवात केली: “पहा, आमचा भुरा सध्या एक agro-based Direct-to-Consumer स्टार्टअपचा Founder आणि Managing Director आहे. आम्ही organic health आणि wellness सेक्टरमध्ये काम करतो. ”

हे ऐकून मुलीचे वडील अर्धे प्रभावित झालेच. “वा! मग नेमकं तुमचं प्रॉडक्ट काय आहे?”

भुराचे वडील आत्मविश्वासाने पुढे म्हणाले: “आमच्या मुख्य पोर्टफोलिओमध्ये high-protein roasted legumes आणि traditional caramelized sweets आहेत. आम्ही कच्चा माल थेट wholesale supply chain मधून घेतो, आणि मग तो आमच्या स्वतःच्या thermal processing unit मध्ये dry-roast करतो. आणि सर्वात मोठं वैशिष्ट्य म्हणजे आमचं packaging 100% eco-friendly आणि biodegradable आहे!”

हे सगळं ऐकून मुलीचं कुटुंब थक्क झालं. एखाद्या मोठ्या multinational कंपनीसारखं वाटत होतं!

मुलीच्या काकांना राहवलं नाही, त्यांनी विचारलं: “तुमच्या कंपनीचं मुख्य ऑफिस कुठे आहे? आणि किती कर्मचारी आहेत?”

अजिबात न घाबरता भुराचे वडील म्हणाले: “पहा, हा modern lean startup चा काळ आहे, त्यामुळे आम्ही दुकानाचं भाडं आणि वीज यांसारख्या अनावश्यक खर्चांना टाळतो. आमच्याकडे एक mobile retail outlet आहे, जो रोज traffic आणि लोकांच्या गर्दीनुसार जागा बदलतो. आणि सगळं काम माझा मुलगा एकटाच पाहतो — तो एक solopreneur आहे!”

आता मात्र मुलीचे वडील पूर्णपणे गोंधळले. ही इंग्रजी त्यांना काही समजेनाशी झाली. ते म्हणाले: “मला ही marketing language नीट समजली नाही. साध्या भाषेत सांगाल का, मुलगा नेमकं काय करतो?”

तेवढ्यात कोपऱ्यात बसलेला मुलाचा मित्र हळू आवाजात म्हणाला: “काका, याचा अर्थ असा आहे की आपला भाऊ हायवेवर गाडी लावून शेंगदाणे, भाजलेले हरभरे आणि रेवडी विकतो! तो कढईत वाळूत हरभरे भाजतो आणि वर्तमानपत्राच्या घड्या करून ग्राहकांना देतो — ज्याला हे लोक biodegradable packaging म्हणतायत!”

हे ऐकून मुलीच्या वडिलांच्या हातातील चहाचा कप पडायचीच वेळ आली!

म्हणून मित्रांनो, marketing शब्दांची जादू फार मोठी असते. तुमची presentation जोरदार असेल, तर शेंगदाण्याची गाडी सुद्धा corporate startup वाटू शकते!

लेखक:अज्ञात

प्रस्तुती :श्री अमोल केळकर

बेलापूर, नवी मुंबई, मो ९८१९८३०७७९

poetrymazi.blogspot.in, 

kelkaramol.blogspot.com  

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचतांना वेचलेले ☆ माझा गाव चोरीला गेला… – कवी : अज्ञात ☆ प्रस्तुती – सौ. शीतल कुलकर्णी ☆

शीतल कुलकर्णी

📖 वाचताना वेचलेले 📖

☆ माझा गाव चोरीला गेला…  – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – सौ. शीतल कुलकर्णी 

कोकिळेची साद होती,

 कोंबड्याची बांग होती l

*

टाक्यावरच पाणी पिऊन,

 जनावरे पण तृप्त होती l

*

इरला होता, कांबळा होता,

 लट्यात पण उब होती l

*

नाचणी होती, वरी होती,

 भाकरीला पण चव होती l

*

पिटी होती, तेरा होता,

 डांगर पण लय होता l

*

जाता होता, घिरट होती,

 हिडका लावची कला होती l

*

बिवळा होता, मूडी होती,

 यट धरायची मजा होती l

*

परसा होता, उतव होता,

 शेणीसाठी खोप होती l

*

सूप होत, रवळी होती,

 बनवण्याची कला होती l

*

मडकी होती, वाळमांड होती,

 डोण्यात सुद्धा पेज होती l

*

गाई होत्या, म्हैशी होत्या,

 बुडकुल्यात दूध होता l

*

नांगर होता, जू होता,

 इरी – इरीची साद होती l

*

ढोरं होती, पोरं होती,

 पोरं पण निर्व्यसनी होती l

*

मासे होते, मटण होतं,

 कोक्याची पण माष्टा होती l

*

डोम्यां होता, खून होती,

 व्हाळात पण मासे होते l

*

कोयता गेला, आकडी गेली

 पाजळण्याची पायरी केली l

*

पाटा गेला, व्हायन गेला,

 मुसळाचा वसया गेला l

*

गरी गेली, डेकळे गेले,

 करंडात आता कांदे आले l

*

लाट गेली, कोळंब्या गेला,

 फापाळ्या वरची उडी गेली l

*

राख गेली, कोंडला गेला,

 कोंडल्यातले कुत्रे गेले l

*

घूड गेले, रवनी गेली,

 कवटाची पण पोळी गेली l

*

कवळा गेली, गोवरी गेली,

 काजू भाजायची मजा गेली l

*

असा माझा गाव होता,

 कोणी मेल्याने चोरून नेला l

*

असा माझा गाव होता,

 कोणी मेल्याने चोरून नेला l

 

कवी: अज्ञात

प्रस्तुती : शीतल कुलकर्णी

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ “शब्दकळा…” – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – राधा पै ☆

राधा पै

? वाचताना वेचलेले ?

☆ “शब्दकळा…” – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – राधा पै ☆

सूनबाईंनी घासून ठेवलेली देवाची उपकरणे सासूबाई पुसून ठेवत होत्या. मधेच म्हणाल्या “ अगबाई ! आज निरांजन नुसतंच कुरवाळलेलं दिसतंय ! “ बी. ए. मराठी असलेल्या सूनबाईंना वाक्याचा अर्थ कळायला अंमळ वेळच लागला ! अर्थ लागला तेव्हा हसू आणि राग या दोन्हीचं मिश्रण असलेला एक वेगळाच भाव चेह-यावर उमटला. सासूच्या उत्कृष्ट मराठीला दाद द्यावी की चूक काढली म्हणून फणकारा दाखवावा हे तिला कळेचना !

मराठी भाषा फार मजेशीर आणि संपन्न – समृद्ध आहे. तिचा वापर पूर्वीच्या न शिकलेल्या, कमी शिकलेल्या स्त्रिया फार चतुराईने करत ! ‘शर्करा अवगुंठीत’ शब्दांचा वापर लीलया होत असे.

आमचे एक परिचित होते. घर म्हणजे नांदतं गोकुळ ! मुलांच्या दंग्यानं अन् पसा-यानं तिथल्या आजी कावलेल्या असत. ‘ आवरलेलं घर ‘ हे दृष्य फक्त सणावारी किंवा कोणी पाहुणा येणार असेल तरच ! कधी त्यांच्या घरी डोकावलं तर आजी नातवंडांना ओरडताना दिसत. पसा-यात बुडालेल्या आजी सहज बोलून जात, “ कार्टी बसतील तिथे * ठेवतात ! “ हे वाक्य तेव्हा मला मजेशीर वाटायचं. आजवर ते लक्षात असूनही वापरायचा धीर मात्र होत नाही.

माझी एक धष्ट पुष्ट मैत्रीण कामावरुन येताना जिमला जाऊन येत असे. त्या दिवशी तिच्याशी जरा बोलायचं होतं म्हणून साधारण ती येण्याच्या जरा आधीच मी तिच्या घरी गेले. तिच्याकडे सासूबाई आणि आजेसासूबाई अशा दोघीही होत्या. सासूबाई साधारण सत्तरीच्या. मैत्रिणीला यायला थोडा उशीर होणार होता. त्यामुळे सासूबाई भराभर कामं उरकत होत्या. मी आपलं सहज म्हटलं “ काकू, तुम्ही अजूनही फिट आहात अगदी !” लगेच आजी उद्गारल्या “ काय करणार बाई, तरण्या झाल्या बरण्या अन् म्हाता-या झाल्या हरण्या “ ! मी उगीच अंग चोरुन अन् सावरून बसले.

म्हणी अन् वाक्प्रचारांचा वापर करावा तर तो मागच्या पिढीनेच. फारशा शिकलेल्या नसूनही या स्त्रिया सुसंस्कृत आणि प्रसंगी असंस्कृत भाषाही वापरत असत !

वेगळ्या अर्थानं गाजलेल्या एका ओळखीतल्या मुलीचं लग्न तशाच अर्थानं गाजलेल्या मुलाशी झालं, तेव्हा माझी आजी सहज बोलून गेली “हडळीला नव्हता नवरा अन् झोटिंगाला नव्हती बायको ! आता जोडी छान जमली. “

आजोळी पूर्ण सुट्टी घालवल्यानंतर ( तेव्हा उन्हाळा आणि दिवाळीच्या सुट्टीत कुठले टूर किंवा ट्रीप्स नसायच्या. कधी वडिलांच्या मूळ गावी, कधी आईच्या माहेरी मुक्काम. हाच बदल. ) जूनमधे शाळेत गेले. पहिला दिवस, मराठीच्या बाई वर्गात आल्या. गप्पा टप्पा सुरु झाल्या. मधेच हसत हसत माझ्याकडे बघून म्हणाल्या “ वा ! गालांवर अगदी रुई फुललीय ! “ क्षणभर मी गोंधळले आणि मग अर्थ कळून रुईतच खुद्कन हसले होते.

अगदी शेलक्या शब्दांत उल्लेख करायला मराठी भाषेत उदंड शब्दसमूह आहेत.

आमच्या नात्यातल्या एका मुलीचं लग्न जमायला जरा अवघड जात होतं कारण काय ? तर म्हणे “ म्हशीनं पाय दिलाय ना नाकावर !” गोरीपान मुलगी असेल आणि तिचा नक्षा जर कुठलं वाक्य उतरवत असेल तर “ पांढरी पाल तर आहे, रंग काय चाटायचाय? “ अत्यंत आळशी पुरुषाचा उल्लेख सहजपणे “ दिवसभर शेणाच्या पोसारखा पडलेला असतो “ असा होई. खरं तर वरची वाक्यं मन दुखावणारी नाहीत का ? पण आमच्या आसपासचा स्त्रीवर्ग सहजपणे हे बोलून जाई. ऐकणा-याला पण फार खेद खंत वाटत नसे.

चांगलं पण बोललं जाई बरं का ! एखादी मुलगी सुदृढ असेल तर “ अहो, दहा जणांचं कुटुंब हसत सांभाळेल. “ एखादीसाठी “इतकी रुपवान आहे की वाटेवरचा चोर सुद्धा उचलून नेईल” (म्हणजे काय म्हणायचे असेल? ) कोणी सुग्रण असेल तर “ अहो, पुरणपोळी विरघळते तोंडात, पाण्याला फोडणी दिली ना तरी ओरपत बसाल !”

आताच्या काळात एखादी स्त्री ‘ ब्युटीफुल, गॉर्जियस ‘ दिसत असेल. तेव्हा

 ‘ चारचौघींसारखी ‘, ‘ दहाजणीत उठून दिसेल अशी ‘, ‘ लाखात एक ‘ असे उल्लेख असत आणि त्यावरून रुपाचा अचूक अंदाज येई !

अर्थात पुरुषवर्गही यातून सुटत नसे. शेलकी विशेषणं त्यांच्यासाठीही असत. ‘आग्यावेताळ, जमदग्नीचा अवतार, दुर्वास मुनी, पिंपळावरचा मुंजा, पाप्याचं पितर, लुंग्या सुंग्या’ वगैरे वगैरे ! बरं शब्दकोषात याचे अर्थ शोधायची गरजच नव्हती. आपलं ऐकणं आणि निरीक्षण यातून अचूक अर्थ कळे. ‘ फाटका इसम ‘ मात्र मी बरेच दिवस शोधत होते ! ‘मदनाचा पुतळा ‘ बापकमाईवर जगत असेल तर त्याला शून्य किंमत होती. अचूक शब्दांचा अचूक जागी उपयोग करायला तीक्ष्ण बुद्धी लागते. शाळा कॉलेज फारसं न पाहिलेल्या त्या पिढीकडे ती होती.

गॉसिपिंग त्याही काळात होतंच. घरातल्या ज्येष्ठा व्हरांड्यात, ओट्यावर, अंगणातल्या बाजांवर निवडणं टिपण करत मस्त वेळ घालवत. “ हातपाय लुळे अन् जीभ चुरुचुरु वळे “ असं माझी आजी म्हणे. अशा गप्पांचा उल्लेख कोणी उखाळ्या पाखाळ्या काढणे असाही करे !

ही अशी खमंग, लज्जतदार, मर्मभेदी, वर्मभेदी कधी सभ्य असूनही असभ्य भासणारी मराठी भाषा आमच्या पिढीतच लुप्त होऊ लागली होती. आता तर ती परोठे, ठेपले, पिझ्झा, बर्गरच्या संस्कृतीत विलीन झाली आहे. आंग्लाळलेल्या मराठीत तो ठसकाच नाही, ती मज्जा नाही ! पिढीगणिक भाषा बदलत जाते. ‘ती व्यक्ती’चा ‘तो व्यक्ती’ कधी झाला, समजलं तरी का ? आज प्रसिद्धीमाध्यमांवर जे मराठी बोललं जातं ते ब-याचदा अनाकलनीय असतं. “** पण नांदा“ ! भाषा जिवंत राहायलाच हवी ! सगळ्याचं मिश्रण असलेली भेळ नाही का आपण आवडीनं खातो!तसंच, ही मराठीपण आपलीच आहे, नाही का ?

 

लेखक:अज्ञात

प्रस्तुती:सौ.राधा पै

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ “मनाच्या सवयी” – लेखक – अज्ञात ☆ प्रस्तुती – श्री अनिल वामोरकर ☆

श्री अनिल वामोरकर

📖 वाचताना वेचलेले  📖

☆ “मनाच्या सवयी” – लेखक – अज्ञात ☆ प्रस्तुती – श्री अनिल वामोरकर ☆

Instant Gratification – संयम हरवलेल मन

काल एका देवळाच्या रांगेत दर्शनाला भाविक उभे होते, तेव्हा एक माणूस रांगेत पुढे उभारण्यासाठी व लगेच दर्शन घेण्यासाठी वाद घालत होता, हे पाहून हे लक्षात आले की आपल्या सगळ्यांना सगळ्या गोष्टी लगेच हव्या असतात.

आज, आता, ताबडतोब!

 

जेवण हवं तर instant noodles.

मनोरंजन हवं तर ३० सेकंदाची reel.

खरेदी हवी तर one day delivery.

खेळ हवा आहे तर झटपट निकाल.

आणि यशही हवं ते overnight success!

 

थांबणं, वाट पाहणं, एखादी गोष्ट हळूहळू घडू देणं —

ही सवय जणू आपल्या सर्वांच्या आयुष्यातून हरवत चालली आहे.

 

मानसशास्त्रात यालाच म्हणतात Instant Gratification —

म्हणजे ताबडतोब सुख मिळवण्याची सवय.

 

रस्त्यावर सिग्नल लागतो. तीस सेकंदही झाले नसतात आणि मागून हॉर्न वाजायला सुरुवात होते. जणू त्या तीस सेकंदांवरच आयुष्याचं भविष्य ठरणार आहे.

 

इंटरनेट थोडं slow झालं की चिडचिड. फूड डिलिव्हरी दहा मिनिटं उशिरा आली की राग.

 

आजचं मन जणू एका विचित्र मोडमध्ये जगत आहे —

“आत्ता… लगेच… instant. ”

 

या सवयीचा परिणाम फक्त आपल्या वागण्यात दिसतो, पण तो आपल्या मेंदूतुन आणि मनातून तयार होतो.

 

जेव्हा आपल्याला लगेच आनंद मिळतो — मोबाईल notification, reel, likes, instant fast food — तेव्हा मेंदूमध्ये dopamine नावाचं रसायन वाढतं. हे dopamine मेंदूला सांगतं — “हे पुन्हा कर… यात मजा आहे. ” म्हणून आपण पुन्हा मोबाईल उघडतो, पुन्हा reels पाहतो, पुन्हा पटकन आनंद देणाऱ्या गोष्टी करतो.

हळूहळू मेंदूला सवय लागते जलद आनंदाची.

मग जे काम वेळ घेणारं आहे — अभ्यास, व्यायाम, नातं टिकवणं, करिअर घडवणं — त्यात मन टिकत नाही. कारण तिथे instant reward नसतो.

 

एका अर्थाने आजचा मेंदू जणू reel-training सारखा क्षणिक आनंदाचा गुलाम झाला आहे.

३० सेकंदात excitement.

 

पण आयुष्य reel नसतं…

तो full चित्रपट असतो.

आणि समजायला, जगायला, अनुभवायला

फक्त संयम लागतो.

मनशांतीचा उगमही संयमातून होतो.

अधीर मन धारदार असतं. टोचणारं, बोचणारं आणि मानसिक समाधानाचे तुकडे करणारं.

 

एका रोपट्याला झाड व्हायला वर्षं लागतात. पण आपण रोज मुळं उपटून पाहिलं — “वाढलं का? ” तर ते झाड कधीच वाढणार नाही.

 

पण आज आपण आयुष्याबरोबरही हेच करत आहोत.

 

थोडा संघर्ष आला की हार.

थोडं नातं कठीण झालं की दूर.

थोडा वेळ लागला की निराशा.

 

कारण मनाला संयमाची सवय उरलेली नाही.

 

खरं तर आयुष्यातील मोठ्या गोष्टी instant मिळत नाहीत. विश्वास तयार व्हायला वेळ लागतो. नातं मजबूत व्हायला वेळ लागतो. यश घडायला वर्षं लागतात.

 

आजच्या जगात वेग सगळ्यांकडे आहे. पण संयम फार थोड्यांकडे आहे. जग फास्ट झालंय, असं सर्वांना वाटतंय, पण पृथ्वी त्याच संयमी वेगाने फिरतेय. निसर्गचक्र तसेच आहे. माणसाने मोहाच्या पाठी गती बदलली आहे बस!

 

संयमी राहणं ही अचानक येणारी गोष्ट नाही; ती हळूहळू तयार होणारी सवय आहे. कधी कधी उतावळेपणा वाटला तर थोडा विराम घ्यायला शिका. लगेच प्रतिक्रिया देण्याऐवजी काही क्षण शांत राहा. प्रक्रियेवर विश्वास ठेवा — कारण मोठ्या गोष्टींना वेळ लागतो. मोबाईलपासून कधी कधी थोडं अंतर ठेवा — कारण instant आनंदाची सर्वात मोठी सवय आज मोबाईल लावतो.

 

कारण संयम म्हणजे फक्त थांबणं नाही…

तर योग्य वेळी गोष्टी होतील यावर विश्वास ठेवून थांबणं आहे.

 

संत होणं कदाचित कठीण असेल…

पण संयमाने शांत राहणं ही प्रत्येकाला शिकता येणारी कला आहे.

 

कारण आयुष्यात झाडावरील आनंदाची फुलं instant फुलत नाहीत तर ती

संयमानेच फुलतात आणि समाधान, आत्मशांतीचा सुगंध सर्वत्र वाटतात.

 

 लेखक : अज्ञात

प्रस्तुती – श्री अनिल वामोरकर

अमरावती

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares