मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆’MY SOUL HAS A HAT…’ – मूळ रचना : मारिओ दि अन्द्रादे – अनुवाद : कॅप्टन वैभव दळवी ☆ प्रस्तुती : डॉ ज्योती गोडबोले ☆

डॉ ज्योती गोडबोले

? वाचताना वेचलेले ?

‘MY SOUL HAS A HAT…‘ – मूळ रचना : मारिओ दि अन्द्रादे – अनुवाद : कॅप्टन वैभव दळवी ☆ प्रस्तुती : डॉ ज्योती गोडबोले

 

– – – आणि अचानक लक्षात आलं..

 

आज मी माझी सरलेली वर्ष मोजली 

आणि अचानक लक्षात आलं..

अरेच्चा! जेवढं जगून झालंय 

त्यापेक्षा कमीच उरलंय की जगायचं..

मग एखाद्या लहान मुलाचं कसं होतं ना..

खूप आवडीचा खाऊ खाताना..

तसं झालं काहीसं…

 

सुरुवातीला तो आवडीने खाऊ खातोच 

पण जेंव्हा त्याच्या लक्षात येतं की 

आता थोडासाच खाऊ उरलाय, तेंव्हा मात्र 

ते मूल खाऊ अधिकच चवीचवीने 

आणि अगदी मन लावून खायला लागतं.

 

कुठल्याच संकेत, नियम आणि कायदयांचं पालन होणार नाहीय 

हे पुरेपूर ठाऊक असताना..

केवळ त्यांचीच चर्चा करणाऱ्या प्रदीर्घ बैठकांसाठी आता माझ्याकडे वेळ नाही.

 

ज्यांची केवळ वयच वाढलीत.. बुद्धी नाही.. अशा मूर्ख लोकांना सहन करण्याचा संयम 

आता माझ्यात अजिबात उरलेला नाही.

 

फार कमी वेळ उरलाय माझ्याकडे..

आता मला फक्त अर्क हवा आहे..

आत्मा घाईत आहे माझा…

फार थोडा खाऊ शिल्लक आहे माझ्याजवळ आता.

 

मला माणसांच्या जवळ जगायचंय आता..

खऱ्याखुऱ्या माणसांच्या…

ज्यांना माहीत आहे, आपल्या स्वतःच्या चुकांवर कसं हसायचं.

ती माणसं..

जी विजयाच्या गर्वाने फुगलेली नाहीत 

आणि ती माणसं…

जी त्यांनी केलेल्या कर्माची संपूर्ण जबाबदारी घेतात.

खरंतर अशा प्रकारेच माणसाची प्रतिष्ठा अबाधित राहते 

आणि आपण कायम सत्य आणि प्रमाणिकतेच्या मार्गावर राहतो.

 

आपलं आयुष्य कामी येणं..

उपयुक्त होणं हे अत्यंत महत्त्वाच.

 

मला अशी माणसं माझ्या अवतीभवती हवी आहेत की ज्यांना दुसऱ्यांच्या हृदयाला स्पर्श कसा करायचा 

हे चांगलंच ठाऊक आहे…

अशांच्या हृदयाला… ज्यांनी आयुष्याचे सणसणीत फटकारे झेललेत,

आत्म्याच्या पवित्र, मधुर स्पर्शाने 

ज्यांना तरीही मोठं केलंय.

 

हो आहे मी घाईत..

मी आयुष्याला उत्कटतेने जगण्याच्या घाईत आहे..

ती उत्कटता…

जी केवळ प्रगल्भतेतून येते.

आता माझ्याकडे उरलेली जराशीही मिठाई फुकट घालवायची माझी इच्छा नाही.

 

मला नक्की माहीत आहे की ही मिठाई अतिशय उत्तम आहे..

मी आत्तापर्यंत खाल्लेल्या खाऊपेक्षाही खूप सुग्रास.


माझं आता एकच ध्येय आहे…

माझ्या प्रेमीजनांसोबत आणि सद्सद्विवेक बुद्धीसोबत समाधानात आणि शांततेत 

अखेरचा क्षण गाठणं.. बस.

 

आपल्याकडे बरं का दोस्तांनो…

दोन आयुष्य असतात..

आणि दुसरं आयुष्य सुरू होतं जेंव्हा लक्षात येतं 

की आपल्याकडे जगायला फक्त एकच आयुष्य आहे..

(मारिओ दि अन्द्रादे या ब्राझिलियन कवीच्या ‘MY SOUL HAS A HAT’  या कवितेचा स्वैर अनुवाद. -)

अनुवाद : कॅप्टन वैभव दळवी

प्रस्तुती : डॉ ज्योती गोडबोले

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ “श्रीमंत…” – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – सुश्री प्रभा हर्षे ☆

सुश्री प्रभा हर्षे

? वाचताना वेचलेले ?

☆ “श्रीमंत…” – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – सुश्री प्रभा हर्षे ☆

तुला कसं कळतं की तू *श्रीमंत* आहेस?

– – एक अद्भुत उत्तर – – एका IIT विद्यार्थ्याकडून… 

जेव्हा मी माझं B. Tech करत होतो, तेव्हा आमच्याकडे ‘Mechanics’ शिकवणारे एक प्राध्यापक होते.

त्यांचे लेक्चर्स खूपच रंजक असायचे कारण त्यांची शिकवण्याची आणि संकल्पना समजावण्याची पद्धत वेगळीच होती.

एकदा वर्गात त्यांनी काही प्रश्न विचारले:

१. शून्य म्हणजे काय?

२. अनंत म्हणजे काय?

३. शून्य आणि अनंत एकच असू शकतात का?

आम्हाला वाटलं की आम्हाला उत्तरं माहिती आहेत आणि आम्ही म्हणालो:

– शून्य म्हणजे काहीच नाही.

– अनंत म्हणजे कोणत्याही मोजता येणाऱ्या संख्येपेक्षा मोठी संख्या.

.. शून्य आणि अनंत हे विरुद्ध आहेत आणि ते कधीच सारखे होऊ शकत नाहीत.

त्यांनी आम्हाला प्रतिवाद करत विचारलं – अनंत म्हणजे नेमकं काय? कोणतीही संख्या कशी काय कोणत्याही मोजता येणाऱ्या संख्येपेक्षा मोठी असू शकते?

.. आमच्याकडे उत्तर नव्हतं.

मग त्यांनी अनंताची संकल्पना एका मनोरंजक पद्धतीने समजावून सांगितली, जी मला आज ३५ वर्षांनंतरही आठवते.

ते म्हणाले – एखादा निरक्षर मेंढपाळ आहे, ज्याला फक्त २० पर्यंत मोजता येतं अशी कल्पना करा.

जर त्याच्याकडे २० पेक्षा कमी मेंढ्या असतील तर तो नेमकी संख्या सांगू शकेल (जसं की ३, ५, १४ वगैरे).

पण जर संख्या २० पेक्षा जास्त असेल, तर तो म्हणेल – “खूप आहेत. ”

त्यांनी मग समजावलं की विज्ञानात “अनंत” म्हणजे ‘खूप आहेत’ (आणि मोजता न येण्याजोगं नव्हे) आणि त्याचप्रमाणे “शून्य” म्हणजे ‘फार कमी’ (आणि काहीच नाही नव्हे).

– – उदाहरण म्हणून ते म्हणाले – जर पृथ्वीचा व्यास सूर्यापर्यंतच्या अंतराशी तुलना केली, तर पृथ्वीचा व्यास फारच लहान असल्यामुळे त्याला शून्य म्हणता येईल.

पण हाच पृथ्वीचा व्यास जर एका धान्याशी तुलना केला, तर तोच व्यास अनंत म्हणता येईल.

… म्हणून त्यांनी निष्कर्ष काढला की तीच गोष्ट शून्यही होऊ शकते आणि अनंतही, हे पूर्णपणे संदर्भावर, किंवा तुलना करण्याच्या मापदंडावर अवलंबून असतं.

*श्रीमंती* आणि गरिबी यांचं नातं देखील शून्य आणि अनंत यांच्यासारखंच आहे.

.. हे सगळं तुमच्या इच्छांच्या तुलनेवर अवलंबून आहे.

… जर तुमचं उत्पन्न तुमच्या इच्छेपेक्षा जास्त असेल, तर तुम्ही *श्रीमंत* आहात.

जर तुमच्या इच्छा तुमच्या उत्पन्नापेक्षा जास्त असतील, तर तुम्ही गरीब आहात.

मी स्वतःला *श्रीमंत* मानतो कारण माझ्या इच्छा माझ्या उत्पन्नापेक्षा खूपच कमी आहेत.

मी *श्रीमंत* झालोय ते खूप पैसा मिळवून नव्हे, तर माझ्या इच्छांना कमी करूनच, मोह माया (उदाहरणार्थ – व्यसन) पासून लांब राहूनच….

जर तुम्ही तुमच्या इच्छांना कमी करू शकलात, मोह माया यापासून लांब राहू शकलात, तर तुम्हीही या क्षणी *श्रीमंत* होऊ शकता…, परंतु तुम्ही जर मोह मायेत अडकलेले आहात तर.. , नक्कीच नाही…

– – – तुमचंही आयुष्य नेहमी चांगल्या विचारांनी, चांगल्या कर्मांनी, चांगल्या लोकांनी, संबंधांनी आणि सुंदर मित्रांनी *श्रीमंत* होवो, हीच सदिच्छा…

लेखक: अज्ञात

प्रस्तुती : सुश्री प्रभा हर्षे 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ “ICU अर्थात… ‘I See You’ ची रूम” – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – सौ. मंजुषा सुनीत मुळे ☆

सौ. मंजुषा सुनीत मुळे

📚 वाचताना वेचलेले 📖

☆ “ICU अर्थात… ‘I See You’ ची रूम” – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – सौ. मंजुषा सुनीत मुळे ☆

*जगात सर्वात सुंदर जागा जर कोणती असेल तर ती म्हणजे आय्. सी. यु.!! *

*मीपणा अंगात आला असेल, अंगात खूप गर्मी असेल, मी कुणीतरी मोठा असल्याचा माज असेल, श्रीमंतीची घमेंड असेल, पदाचा बडेजाव असेल तर आय्. सी. यु. ची रूम बघावी आणि विचार करावा. *

 *दोन व्यक्तींमध्ये भेद निर्माण करणारी कोणतीच रेषा इथे नसते. तुमचा धर्म, जात, वर्ण, श्रीमंत, गरीब… एवढंच नाही तर स्त्री-पुरुष हा भेदही इथं नसतो!! *

 *तो काचेचा दरवाजा ओलांडून आय्. सी. यु. मध्ये आलात की सगळे भेद जिथे चपला सोडता तिथेच गळून पडतात. आत जाते ते फक्त मानवाचे शरीर…!!! *

 *आयुष्याचा अर्थ उलगडून सांगणारी लाखो पुस्तकं, ग्रंथ असतील किंवा जगावं कसं हे शिकवणारे असंख्य गुरू सुध्दा असतील. पण जो अर्थ, जे तत्वज्ञान इथं आय्. सी. यु. मध्ये मिळतं, ते कुठेच वाचायला मिळत नाही!! आयुष्याचा खरा अर्थ येथेच कळतो!! *

 *म्हणूनच ही जागा खरोखरच फार सुंदर आहे. *

 *एखाद्या घरात भुताटकी असते, कोणीतरी कधीतरी तिथं मेलेलं असतं, लोकांना तिथे भीती वाटते. कुठेतरी रस्त्यावर, मोठ्या झाडाखाली अशाच अफवा असतात, भीती असते. * 

*पण इथं… इथं आय्. सी. यु. च्या एकेका बेडवर आजवर शंभर, दोनशे, असंख्य लोक मेलेले असतात!! कसली भीती नाही, काही अफवा नाहीत. माणूस गेला, बेडशीट बदललं, दुसरा माणूस आला.. एवढं सोप्पं असतंय इथं!! *

*हिंदू, मुस्लिम, ख्रिश्चन, बौद्ध, जैन, शीख, पारशी, आस्तिक, नास्तिक जे कोणी असतील त्या सगळ्यांच्या फुफ्फुसात एकाच मशिनमधून ऑक्सिजन जातो. * 

– – *आपण बाहेर बारीक सारीक गोष्टींचा विचार करत असतो. कोणाला काय वाटेल या विचारात असतो. कपडे कसे आहेत, लोक हसतील का माझ्या अवताराला, बोलण्याला, भाषेला… इथं बेडवर त्या कोणत्याच गोष्टीला किंमत नसते. पुरुष असो की स्त्री… लाज वगैरे गोष्टींना तिथं किंमत शून्य असते! *

*वेळेची खरी किंमतही सर्वात जास्त इथेच कळते. जेव्हा आपल्याला कळतं की आपली व्यक्ती आपल्याला सोडून जाणार आहे तेव्हा एकच गोष्ट डोक्यात असते… फक्त आणखी एक दिवस, एक तास, अजून पाच मिनिटं मिळावी. *

*बाहेरच्या जगात आपण असंख्य अपेक्षा घेऊन जगत असतो. लोक स्वत: कडून, इतरांकडून… अपेक्षांचा डोंगर घेऊन चालत असतात. घर, गाडी, शिक्षण, नोकरी, प्रेम, व्यवसाय, नातेवाईक, पैसा… ‌असंख्य अपेक्षा! * 

*तिथे फक्त एकच अपेक्षा असते. अजून एकदा… फक्त एकदा… डोळे उघडावेत…!!!! *

*आयुष्यात कधी वाटलंच की मी फार मोठा आहे तर अशा ठिकाणी जाऊन यायचं… सगळी घमेंड उतरते! * 

*कधी वाटलंच की, माझ्याकडे काहीच नाही, सगळं संपलं आहे… तेव्हाही जायचं… आपल्याला कळतं की आपल्याकडे काय आहे! *

*निसर्गाने माणूस निर्माण करतेवेळी जो उद्देश समोर ठेवला असेल त्या स्वरूपातील ‘ माणूस ‘ मला तिथे दिसतो… अर्थात्… * 

 *I See You* 

*म्हणूनच ही जागा जगात सर्वात सुंदर आहे! *

– – – सर्व धर्म, जात, भाषा, प्रांत व लिंग ह्यातील भेद नष्ट करणारे ICU.

लेखक: अज्ञात

प्रस्तुती : सौ. मंजुषा सुनीत मुळे 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈ 

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ “हे कुठले रंग?…” – लेखक : श्री विद्याधर शेणोलीकर ☆ प्रस्तुती – सौ. शोभा जोशी ☆

सौ. शोभा जोशी 

? वाचताना वेचलेले ?

☆ “हे कुठले रंग?” – लेखक : श्री विद्याधर शेणोलीकर ☆ प्रस्तुती – सौ. शोभा जोशी ☆

” हे कुठले रंग…? “.

आमच्या एम. आय. टी. कॉलेज परिसरात कोणताही सणवार म्हणजे नुसता नंगानाच असतो. बाहेरून आलेली मुलं-मुली आणि त्यांच्या नादानं आपली मराठमोळी मुलं-मुली नुसता धांगडधिंगा करत असतात. आज खाली चौकात रंगपंचमी निमित्त बरीच मुलं जमून रंग खेळत आहेत आणि हातात दारूच्या बाटल्या आहेत. खरंतर पूर्वी पुण्यात धुळवडीला रंग खेळतच नव्हते. रंगपंचमी ही पंचमीलाच साजरी केली जायची. परंतु आता सोशल मीडियामुळे देशभरातल्या विविध सणवारांचं वारं सर्वांना लागलं आहे आणि आपण कसे परंपरा सांभाळतो हे दाखवण्याची जणू स्पर्धाच सुरू आहे.

 माझ्या आज्ज्यांनी कधी माझ्या आजोबांचा चेहरा चाळणीतून पाहिल्याचं मला आठवत नाही. माझ्या आईनंही माझ्या वडिलांचा चेहरा कधी चाळणीतून पाहिल्याचं मला आठवत नाही. पण आता चाळणीतून नवऱ्याचा चेहरा काय पहा आणि दिवाळीला छोटी दिवाली काय, आणि बडी दिवाली काय…

 काय नाही नाही ते प्रकार ऐकायला आणि पाहायला मिळतात. कसली छोटी दिवाली आणि कसली बडी दिवाली? ? आपल्याकडे दिवाळी ही दिवाळीच असते. आता खरं सांगायचं तर सर्व सणवार हे इव्हेंट झालेले आहेत.

 गणपतीत मंडप जाहिरातींनीच सजून गेलेला असतो आणि प्रायोजकच गणपती पेक्षा जास्त झळकत असतो. म्हणजे गणपती कुठला हे महत्त्वाचं नाही तर प्रायोजक कोण हे महत्त्वाचं…

 विसर्जन मिरवणुकांमध्ये तर डीजे बंद होतील त्या दिवशी बाप्पा खऱ्या अर्थाने पावला असं म्हणावं लागेल…

 “डीजे लावून मिरवणुका”… ही अक्षरशः पुणे शहराला लागलेली कीड आहे…

सामान्य पुणेकर या सगळ्यापासून फार दूर गेलेला आहे. पण आता खऱ्या पुणेकराला विचारतो कोण? ? खरा पुणेकर हा फक्त विनोद करण्यापुरता आणि टोमणे मारण्यापुरताच उरलेला आहे. पुण्याची संस्कृती लोप पावून तिथे विकृती आलेली आहे…

 पुण्यात पूर्वीही पान तंबाखू गुटखा खाणारे होते, परंतु या मंडळींना कुठेतरी मनाला चाड होती. रस्त्याच्या कडेला जाऊन पान तंबाखू थुंकावी एवढी लाज होती. आता सिग्नल ला बिनधास्तपणे तोंडातला गुटखा रिकामा करणे आणि परत वर शांतपणे तुमची प्रतिक्रिया बघणे ही विकृती फोफावत आहे. बसच्या शेजारून जायला तर धाडसच हवे. कधी अंगावर पिचकारी पडेल नेम नाही. आता पेठांमध्येही मटण चिकन खानावळींमध्ये सर्रास मिळते. स्पष्टच बोलायचं तर पुण्याच्या काहीशा ब्राह्मणी संस्कृतीला नाव ठेवत राहणे, सतत पुणेकरांवर टोमणे मारणे, पुणेकरांवर विनोद करणे यातच बाहेरून आलेली मंडळी धन्यता मानतात… आणि हळूहळू इथेच स्थायिक होतात… सध्या पेठा म्हणजे स्पर्धा परीक्षांच्या क्लासेसचे कारखाने झाले आहेत. यात कुणाचं किती करियर होतं हा एक मोठाच प्रश्न आहे. सरकारी जागा पन्नास आणि परीक्षा देणारे पन्नास हजार…

 तरुण मुलं आपल्या आयुष्याचा मौल्यवान वेळ वाया घालवत आहेत हे दिसत असतं. यात खरोखर कोणाचं करियर होत असेल तर ते क्लास चालक, खानावळ वाले, पान सिगरेट वाले आणि जागा भाड्याने देणारे यांचं… या मुलांच्या वेड्यावाकड्या जाणाऱ्या बाईक्स म्हणजे शहराच्या वाहतुकीला डोकेदुखी झालेली आहे. तरुण मुलांमध्ये वाढणारी व्यसनं हा तर एक वेगळाच चिंतेचा विषय आहे. या स्पर्धा परीक्षांना बसणारी पुणेकर स्थानिक मुलं विरळाच आहेत. स्थानिक मुलं आयटी क्षेत्र वगैरे क्षेत्रात करिअर करून परदेशी जायची स्वप्न बघत असतात. पुण्याच्या वाहतुकीत वाहन चालवणं अक्षरशः अंगावर काटा आणणार असतं. पोलिसांवरही पुणेकरांचा विश्वास राहिलेला नाही असं म्हटल्यास वावगं ठरू नये. “हिट अँड रन” ची प्रकरणं वाढत आहेत आणि पुढे या प्रकरणांचं काय होतं हा पुणेकरांसाठी एक मोठाच कुतूहलाचा विषय आहे. आता शिक्षणाचे महत्त्व जाऊन पैशाला अवास्तव महत्त्व आलेलं आहे. बाहेरून आलेले तरुण कामधंदा बघायचं सोडून राजकारण्यांच्या सतरंज्या उचलण्यात धन्यता मानताना दिसतात. लाल सिग्नल तोडून जाणे हे पुणेकरांना आता नवीन चित्र नाही. वाहन चालवताना सतत सावध राहावं लागतं. कोण कुठल्या दिशेने येऊन धडकेल सांगता येत नाही. शिवाय धडकणारा मुजोरपणा दाखवतो तो वेगळाच…

 आता जो जेवढा मोठा गुंड, जो जेवढा मोठा गुन्हेगार तेवढा तो राजकारणात यशस्वी… एस. एम. जोशी, ना. ग. गोरे यांच्यासारखी नेतृत्वं आता लोप पावली आहेत. पूर्वी पुण्यातील सर्वच पक्षांचे राजकारणी अत्यंत सुसंस्कृत होते. भाषेत नम्रता, सुसंस्कृतपणा होता. आता राजकारणात प्रतिस्पर्ध्यांवर चिखलफेक करून रोजच धुळवड खेळली जाते. राजकारण, समाजकारण अत्यंत खालच्या पातळीला गेले आहे. आता घरं तुमच्या-आमच्यासाठी बांधली जात नसून बिल्डरांची पोटं भरण्याकरता बांधली जातात आणि बिल्डरांची पोटं काही भरता भरत नाहीत…

पूर्वी एखाद्या पुणेकराला विचारलं तू पुढे काय करणार आहेस? ?

तर कोणी म्हणायचा मी आय. आय. टी. ची तयारी करतो आहे, कोणी म्हणायचा मी परदेशी जाणार आहे, कुणी म्हणायचा मी एनडीए ची तयारी करतो आहे. आता काय, तर मी इस्टेट एजंट आहे, मी स्पर्धा परीक्षेची तयारी करतो आहे…

इस्टेट एजंट हा प्रकार तर मला कळलेलाच नाही. कुत्र्याच्या छत्रीसारखे गल्लीबोळात इस्टेट एजंट आहेत. पूर्वी कुठल्याही वाड्यामधून निळं आभाळ सहज दिसायचं… मोकळी हवा खेळती असायची… गल्ल्या शांत होत्या…

आता निळं आकाश दिसणं दुर्मिळ झालं आहे. धुकं तर कित्येक वर्षात पुणेकरांनी पाहिलेलंच नाही. दवबिंदू कसे असतात नव्या पिढीला माहीत नाही. चिमण्यांचा चिवचिवाट ऐकू येत नाही…

पूर्वीचा पुणेकर सणवार हौसेनं करायचा. गणपती बघायला जाणे हा एक आनंद होता. एक उत्सुकता असायची. पुण्यातले गणपतीचे देखावे हे साऱ्या महाराष्ट्राचं आकर्षण होतं. स्वीट होम, जनसेवा, पुष्करणी भेळ ही पुणेकरांची विश्रांती स्थान होती. पूर्वीचा पुणेकर भेळेवर, मिसळीवर समाधान मानायचा. त्याला आनंद मिळवण्यासाठी गुटखा, दारू असल्या गोष्टींची गरज पडत नव्हती. ही व्यसन अपवादानेच केली जायची आणि या व्यसनांचा तिरस्कार केला जायचा. आता मात्र यात सगळ्या गोष्टी अभिमानाने मिरवल्या जातात. पुणे शहर हे आता शिक्षणाचं माहेर घर राहिलेलं नसून गुन्हेगारीचं माहेर घर झालेलं आहे असं खेदानं म्हणावसं वाटतं. या सगळ्यात जुन्या पुणेकराचा श्वास घुसमटतो आहे. आता जुनी रंगपंचमी घरात बसूनच आठवायची आणि खिडकीतून बाहेरचा धांगडधिंगा शांतपणे बघत रहायचा…

आणि रंगपंचमी, किंवा एकंदरच सणांच्या नावाखाली काय काय रंग उधळले जातात ते हतबलपणे पहात रहायचं…

एवढंच मूळ पुणेकरांच्या हाती राहिलं आहे…!!!

लेखक : श्री विद्याधर शेणोलीकर

कोथरूड, पुणे.

प्रस्तुती: श्रीमती शोभा जोशी

मो ९४२२३१९९६२ 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ आर एच डायग्नोस्टिक्स… – लेखिका : सुश्री सुधा मूर्ती ☆ सौ. अंजली दिलीप गोखले ☆

सौ अंजली दिलीप गोखले

📖 वाचताना वेचलेले 📖

☆ आर एच डायग्नोस्टिक्स… – लेखिका : सुश्री सुधा मूर्ती ☆ सौ. अंजली दिलीप गोखले

सुधा मूर्ती यांचे वडील आर. एच. कुलकर्णी डॉक्टर होते. त्यांचं पोस्स्टिंग एका खेड्यात झालं होतं. डॉक्टर म्हणून असलेलं ज्ञान, कौशल्य वापरण्याची वेळच येत नव्हती. खेड्यातील लोक बरं वाटेनासं झालं की स्वतःच त्यांना माहीत असलेले नैसर्गिक उपचार करून बरे होत असत…

पण एक रात्र वेगळीच उजाडली…

पाऊस कोसळत होता. विजा चमकत होत्या. ढग गर्जत होते.

अंधार, पाऊस, विजा, लखलखाट नी गडगडाट.

कोणीही पेशंट नसण्याची सवय असलेले आर. एच. कंदिलाच्या उजेडात जेवण उरकून निवांत बसले असतानाच दाराची कडी वाजली.

दारात अनोळखी माणसं उभी होती…

“डॉक्टर सायेब, बॅग घ्या तुमची. येक पेशन्ट बघायला जायचं हाय. “

समोरचे लोक मराठी बोलत होते…

आर. एच. यांनी एकंदर हवामान बघून त्यांना जमेल तितका विरोध करत सांगितलं, “क्लिनिक बंद झालं आहे. “

समोर जे लोक उभे होते त्यांच्या body language मध्ये नुसता आग्रह नव्हता. एक अनुच्चारीत गर्भित धमकी होती. त्यातल्या एकाने डॉक्टरांना जवळजवळ ओढूनच बाहेर काढलं…

डॉक्टर बॅग घेऊन मुकाट्यानं बैलगाडीत बसले…

“मला कुठं नेत आहात? “

त्यांच्या प्रश्नाला उत्तर द्यायची तसदी कोणीही घेतली नाही.

कधीतरी तो प्रवास थांबला. एका घरापुढं बैलगाडी थांबली.

भातांची शेतं भोवताली. अन् मध्यभागी एक घर.

घरातल्या स्त्रीने त्यांना मार्गदर्शन केलं…

“हिकडं… हिकडं ठेवलीय तिला. “

डॉक्टर तिच्या मागं गेले.

अन क्षणात मागं सरकले.

समोर एक सोळा सतरा वर्षांची मुलगी प्रसूती वेदनेनं तळमळत होती.

“मला नाही जमणार हे. मी स्त्री रोग तज्ञ नाही. माझं प्रशिक्षण झालं नाही यात. “

त्यांचा विरोध अगदी फुसका ठरला. समोरची पार्टी अधिक आग्रही, अधिक आक्रमक होती.

“त्ये काय आमाला ठावं न्हाई. तुमी ह्ये बाळातपण करा. तुम्ही म्हणाल तेवढा पैका देतो. “

डॉक्टर गोंधळले. घाबरले. इथून सुटका नाही हे त्यांच्या लक्षात आणून देण्यासाठी की काय त्यांनी त्यांना त्या खोलीत ढकलून दार लावून घेतलं.

बेगुमान कोसळणारा पाऊस, खोलीत ती असहाय मुलगी अन् घाबरलेले आर. एच…

परतीचा मार्ग नाही म्हटल्यावर प्रशिक्षण घेत असताना प्रोफेसर्सना डीलिव्हरीमध्ये असिस्ट केल्याचे एक दोन प्रसंग आठवत त्यांनी काम सुरु केलं.

वेदना आणि दुःख सोसत पडलेली ती मुलगी त्यांना म्हणाली, “काही करू नका. मी मरेपर्यंत इथं बसून रहा. मला नी बाळाला वाचवू नका. “

ती विनंती त्यांचं काळीज कापत गेली…

“काय बोलतेस? मी डॉक्टर आहे. मला शेवटच्या क्षणापर्यंत प्राण वाचवण्याचे प्रयत्न करायचं शिकवलं गेल आहे. “

मुलगी रडली. तिच्या डोळ्यातून पाऊस बरसू लागला…

“हे लोक माझ्या बाळाला मारून टाकतील आणि मला जिवंत ठेवलं तरी बेदम मारतील. आम्हांला वाचवू नका. “

ती पुन्हा पुन्हा विनंती करत होती…

तिनं सांगितलेल्या हकीकतीनुसार ती जमीनदाराची मुलगी होती. शाळा शिकायची म्हणून तिला बाहेर ठेवलं. तिथं प्रेमात पडून तिनं मर्यादा ओलांडली होती. ती गरोदर आहे समजताच तिचा प्रियकर पळून गेला होता. हे सगळं घरच्यांना समजेपर्यंत उशीर झाला होता. गर्भपात करणं रिस्की होतं. म्हणून घरच्यांनी तिला या दुर्गम भागात आणून लपवून ठेवली होती…

बाळंतपण करण्यातील आपला तुटपुंजा अनुभव नी ज्ञान, त्याच्या बरोबरीने दोन जीव वाचवण्याची तळमळ डॉक्टरांनी पणाला लावला…

मुलीनं एका मुलीला जन्म दिला.

मुलगी जन्मली आहे…  समजल्यावर ती आणखी हतबल झाली. जगलोच नशिबानं तरी हिला कसं सांभाळायचं…?

“ती रडत का नाही? मेलीय का ती? बरं होईल मेली असली तर. “

एक नुकतीच आई झालेली मुलगी आपल्या बाळाच्या मरण्याची आशा करत होती…

वेदनेचा न संपणारा हा प्रवास पाहून डॉक्टर पण स्तिमित झाले होते…

“शक्य झालं तर पुण्याला पळून जा. तिथं पुणे नर्सिंग स्कूल आहे, तिथं गोखले म्हणून clerk आहे. त्याला माझं नाव सांग. तो तुला नर्सिंग कोर्सला ऍडमिशन मिळवून देईल. स्वतःच्या पायावर उभी रहा म्हणजे मुलीला वाढवू शकशील. “

त्यांनी तिला सल्ला दिला…

“कशी जाऊ…? माझ्याकडे पैसे नाहीत. “

यावर आर. एच. गप्प झाले. कारण त्या क्षणी त्यांच्याकडे फक्त त्यांची बॅग होती…

आपण काहीच करू शकत नाही ही खंत बाळगत ते बाहेर आले…

“डॉक्टर सायेब, ही घ्या तुमची फी, आन हितं जे काय बी घडलं त्ये भायेर कुटं बोलू नका. “

एका माणसानं त्यांच्या हातावर शंभर रुपये ठेवत त्यांना धमकी दिली…

“माझी कात्री राहिली वाटतं खोलीत, आलोच’ म्हणत आर. एच. पुन्हा मागं गेले. मुलीच्या हातावर शंभर रुपये ठेवत म्हणाले, “हे घे आणि इथून बाहेर पड अन् मी सांगितलं तसं कर. “

“तुमचं नाव काय, डॉक्टर? “, तिनं विचारलं…

“आर. एच. कुलकर्णी. पण लोक मला आर. एच. म्हणतात. “

पावसाच्या राक्षसी आवाजात तिला फक्त आर. एच. एवढंच ऐकू गेलं…

त्यानंतर कित्येक वर्षे गेली. त्यांचं लग्न झालं. पैसे साठवून त्यांनी वयाच्या बेचाळीसाव्या वर्षानंतर चेन्नईच्या कॉलेजमध्ये ऍडमिशन घेऊन ते गायनॉकोलॉजिस्ट झाले. प्रोफेसर झाले. लोकप्रिय डॉक्टर आणि विद्यार्थिप्रिय प्रोफेसर झाले…

एकदा एका मेडिकल कॉन्फरन्समध्ये एका तिशीतल्या महिलेचं रिसर्च presentation ऐकून त्यांनी तिचं अभिनंदन केलं. कौतुक केलं…

मागून कोणी तरी त्यांना जेवायला जाण्यासाठी हाक मारली,

“आर. एच. , जेवायला निघायचं ना? “

“तुमचं नाव काय, डॉक्टर? “

समोरच्या मुलीनं विचारलं. त्यांनी सांगितलं…

“तुम्ही 1943 साली चंदगड मध्ये होता? “

“हो. “

मुलीचे डोळे चमकले.

“डॉक्टर, मी इथून चाळीस किलोमीटर्स दूर राहते. तुम्ही थोड्या वेळासाठी माझ्या घरी येता का? “

तिच्या डोळ्यात आर्जव होतं. पण आर. एच. ना ती विनंती विचित्र वाटली.

“पुन्हा कधीतरी”, म्हणत त्यांनी तिला टाळण्याचा प्रयत्न केला.

“प्लीज डॉक्टर. ही विंनती अशा व्यक्तीची आहे जिनं तुमची कित्येक वर्षे वाट पाहिली आहे. “

आर. एच. गोंधळले. तिच्या नजरेत असणारं कोडं त्यांना सोडवता येत नव्हतं. अखेर ते तिच्या घरी गेले…

ते जिथं पोहचले ते देखील एक नर्सिंग होम होतं…

“आई, हे डॉ. आर. एच. , ज्यांची तू वाट पाहत होतीस. “,

ती म्हणाली.

पन्नाशीतली एक बाई पुढं आली. त्यांच्या पायावर झुकली.

“तुम्हाला मी आठवत नसेल. त्या पावसाळी रात्री तुम्ही मला मदत केली. माझी डिलिव्हरी केली. मला पैसे दिले. त्या काळी शंभर रुपये खूप मोठी रक्कम होती. पण तुम्ही ती सगळी मला देऊ केली. मी पुण्यात आले. तुमच्या मित्राला भेटले. नर्स झाले. माझ्या मुलीला मी योग्य पद्धतीनं वाढवू शकले. माझ्या मुलीनं स्त्री रोग तज्ज्ञ व्हावं ही माझी इच्छा तिनं पूर्ण केली. ती आणि तिचा नवरा इथं प्रॅक्टिस करतात. मी तुम्हाला शोधण्याचा खूप प्रयत्न केला. तुमचं नाव आर. एच. एवढंच ऐकू आलं होतं. दरम्यान तुमचे मित्र गोखले पण वारले. आमच्या नर्सिंग होमच्या उदघाट्नाला तुम्हाला बोलवण्याची माझ्या मुलीची खूप इच्छा होती. पण तुम्हाला संपर्क कसा करायचा हेच समजत नव्हतं. “

आर. एच. भरल्या डोळ्यांनी, त्यांनी घडवलेलं एक हाडामांसाचं भविष्य समोर पाहत होते. डोळ्यातल्या पाण्यानं धूसर झालेल्या चित्रात त्यांनी नर्सिंग होमचं नाव शोधलं. ते होतं…

… “आर एच डायग्नोस्टिक्स “

लेखिका : सुश्री सुधा मूर्ती

(सुधा मूर्ती यांच्या ‘तीन हजार टाके’ पुस्तकातून) 

प्रस्तुती : सौ. अंजली दिलीप गोखले 

मोबाईल नंबर 8482939011

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ “पूर्तता” –  लेखक : श्री पराग दामले ☆ प्रस्तुती – सौ. स्मिता सुहास पंडित ☆

सौ. स्मिता सुहास पंडित

? वाचताना वेचलेले ?

☆ “पूर्तता” –  लेखक : श्री पराग दामले ☆ प्रस्तुती – सौ. स्मिता सुहास पंडित 

आज काकू चकचकीत तयार झाल्या, ठरवून ठेवलेली साडी, चपला, पर्स, हातात घड्याळ… घरात सांगून ठेवलं, येते जेवणाच्या वेळेपर्यंत… खाली उतरल्यावर रिक्षाला हात केला, रिक्षावाल्याला सारसबाग सांगितलं… कोथरुडधून, नळ स्टॉप, म्हात्रे पूल, शास्त्री रोड, निलायमचा चौक, आणि मग सारसबाग… रस्त्यावर थांबून लांबून दर्शन घेतलं… सणस ग्राऊंडला एक फेरी मारली… एक भेळ बांधून घेतली… आता पार्वती पायथा… पायथ्याशी गेल्यावर एक क्षणभर थांबून वरच्या देवळाकडे बघितलं आणि पुन्हा म्हणाल्या आता संभाजी बाग… रिक्षावाला थोडा प्रश्नार्थक नजरेने आरशात बघत होता… काकू रिक्षातून उतरल्या सुद्धा नाहीत आणि आता दुसरी बाग… संभाजी बागेतल्या एका गेटमधून आत जाऊन दुसऱ्या गेटमधून बाहेर पडले… आता शनिवार वाडा, रिक्षावाला बुचकळ्यात पडला होता… बर गि-हाईक तर चांगलं मिळालं आहे, मग तक्रार तरी कसली करायची? … जायचंय तर नेऊ…

शनीवारवाड्याशी आल्यावर दरवाजासमोर गेल्या, पटांगणाकडे एकदा बघितलं.. खारेदाणेवाल्याकडे जाऊन एक पुडी घेतली, पुन्हा रिक्षात बसल्या… आता मात्र रिक्षावाल्याच कुतूहल प्रचंड वाढलं.. विषय काढायचा म्हणून विचारलं, “काकू तुम्ही पुण्यातल्याच का? “, , , , , , ,

“हो, का रे? “…

“सहज विचारलं. “, , , , , ,

“अगदी लहानपणापासून की लग्न झाल्यावर आलात? “, , , , ,

“अरे, मी जन्मापासून पुण्यात आहे…

आता तू ५४६ नारायण पेठेत चल… ”

काय बरं असेल तिकडे? रिक्षावाला मनात म्हणत होता.. अगदी बाहेर ऐकू येईल इतकं जोरात मन बोलत होतं, , , , , ,

काकू पुढे बोलायला लागल्या, “अरे माझं माहेर तिथे होतं पूर्वी… ”

“ओहहहह, तिकडे सीताफळबाग कॉलनीमध्ये नदीत आम्ही मासे पकडायला यायचो… ”

“हो, तिथे एक गोठा आहे, मुलं दिसायची आम्हाला मासे पकडताना… माती गणपतीपाशी दीपमाळ होती, त्यावर दिवे लावले जायचे… कबीर बागेत खेळायची सगळी मुलं… ”

बोलता बोलता माती गणपती आला… ५४६ नारायण पेठ आली, काकू उतरल्या, नवीन बिल्डिंग झाली होती, त्याच्या भिंतीला हात लावला… क्षणभर डोळे ओले झाले, म्हणाल्या, “चल आता पुन्हा कोथरूडला.. ” रिक्षावाल्याला आता प्रकाश पडला.. …. काकूंच्या जुन्या आठवणी ताज्या करायला म्हणून इतकी फिरस्ती झाली…

कोथरूडमध्ये घराशी उतरल्यावर मीटरकडे बघत पैसे सांगितले काकूंनी नोट काढून दिली… त्याने साहजिकच विचारलं, “मला चांगलं गि-हाईक मिळालं, चांगला धंदा झाला, हे सर्व ठीक आहे, , , , , पण इतकं आठवणीसाठी कोणी फिरत नाही हो.. ”

“तस नाहीये रे… लहानपणी आमचे बाबा आम्हाला या सगळ्या ठिकाणी सायकलवर घेऊन जायचे, काहीवेळा तर आम्ही चालत जायचो… तेव्हा मी हट्ट करायचे, रिक्षातून जाऊ… बाबा म्हणायचे, चालल्यामुळे तब्येत छान राहते, भूक छान लागते… दोघात खाल्लेली एक भेळ सहज पचून जाते… पण कळत्या वयात समजलं की रिक्षाला खूप पैसे लागायचे, म्हणून बाबा चालत किंवा सायकलवर न्यायचे… आता यजमान स्कुटरवर नेतात, मुलं मोठी झाली, ती पण नेतात, यात माझं रिक्षात बसून फिरायचं स्वप्न तसच राहून गेलं होतं… ते म्हणतात ती काय ती ” बकेट लिस्ट ” ओसंडून वाहात होती… होईल रिकामी हळू हळू, पुन्हा भरण्यासाठी… ”

… ऐकून रिक्षावाला स्तब्ध झाला… म्हणाला, “खरंय हो. ” त्याचं स्वप्न आठवून म्हणाला, “आकाशात विमान दिसलं की मला पण वाटतं, कधीतरी विमानात बसून, उंचावरून पुणं बघता येईल… बघू कधी स्वप्न पूर्ण होईल.. स्वप्नाचा पाठलाग मी नक्की करीन… स्वप्नपूर्तीला वय नसतं… ”

 

लेखक : श्री पराग दामले 

प्रस्तुती : सौ. स्मिता सुहास पंडित 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ सप्तसोपान… लेखक : श्री विश्वास बीडकर ☆ प्रस्तुती : श्री मिलिंद जांबोटकर ☆

श्री मिलिंद जांबोटकर

📖 वाचताना वेचलेले 📖

☆ सप्तसोपान… लेखक : श्री विश्वास बीडकर ☆ प्रस्तुती : श्री मिलिंद जांबोटकर 

मध्यंतरी एक मस्त जुगलबंदी अनुभवता आली.

डॉक्टर आनंद नाडकर्णी आणि मंगला खाडिलकर यांची शाब्दिक जुगलबंदी होती ती.

सोहळा होता ‘सप्तसोपान’ या वेगळ्या उपक्रमाच्या उद्घाटनाचा.

‘वरिष्ठ आणि जेष्ठ’ यामधलं अंतर समजावून सांगणं हा मूळ उद्देश.

 

समोरच्याचं मन मोकळं करून त्याला बोलतं करणं, यात हे दोघेही सचिन तेंडुलकर.

 

डॉक्टर आनंद नाडकर्णी यांनी सुरुवातीलाच सांगितलं, “आपण जमलो आहोत ते एकाच गोष्टीसाठी, ‘Healthy Aging. ‘

आपल्या नियंत्रित आजाराची फारशी काळजी करण्याची आवश्यकता नाही. तुम्ही सगळे ती घेत असणारच. प्रश्न आहे तो, बौध्दिक क्षमता वाढविण्याचा.

जे आजपर्यंत आयुष्यात केलं आहे, त्यापेक्षा काहीतरी वेगळं केलं की तुम्ही वृध्दत्व विसरणार.

जे शिकलो आहोत, जे आजपर्यंत केलं आहे, तो मार्ग आपल्या मेंदूला पूर्ण परिचयाचा आहे. तो वापरून वापरून थोडा खड्डेमयही झाला आहे.

नवीन रस्ते मेंदूला दाखवले, तर तो परत एकदा उत्साहित होतो, अधिक कार्यक्षम होतो.

म्हणूनच हा ‘सप्तसोपान’चा उपक्रम.

 

वयानं वरिष्ठ होऊ लागलं की प्रथम जाणवतं ते नाते संबंध. इतरांशी आपलं वागणं. या संदर्भात डॉ. नाडकर्णी यांनी सूर्यमालेचा संदर्भ सांगितला. आपण स्वतः म्हणजे सूर्य आणि आपली नाती म्हणजे सूर्यमालेतले ग्रह.

आपण एवढचं लक्षात ठेवायचं, कोणत्या नात्याचा ग्रह आणि त्यातलं अंतर समजून घेणं.

 

वय वाढलं की सगळ्यात कमी होतं जातं ते नवीन शिकणं.

तेचं सप्तसोपानमध्ये करायचं.

 

आमच्यासारख्या बॅंकेत आयुष्य घालवलेल्यांनी संख्या, अकाउंट्स सोडून नवीन काही शिकायचं. काय शिकायचं,

तर, गाणं, ब्रिज असे छंद जोपासण्याचा प्रयत्न. यात फक्त शिकण्याचा आनंद घ्यायचा.

नो परीक्षा. नो नैपुण्य चाचणी.

 

भाजी टवटवीत राहण्यासाठी मध्येमध्ये पाणी शिंपडतात, तसं आपला मेंदू टवटवीत राहण्यासाठी हे नवीन शिकण्याचे शिंतोडे.

 

हे सगळं डॉक्टर समजावून देताना,

मंगला खाडिलकर यांनी एका शब्दात सांगितलं, ‘स्वानंद ‘.

 

पुढे मंगलाताईंचं एक वाक्य मला तरी खूप भावलं,

” प्रत्येक नात्याला एक शेल्फ लाईफ असतं.

जशी पदार्थांची चव बदलते तशी नात्यांचीही. “

या वाक्यावर टाळ्यांचा कडकडाट.

 

तो विरत असतानाच,

डॉक्टरांचं पुढचं वाक्य,

” म्हणूनच त्या नात्यात कृतीचं preservatives टाकायचं! “

परत तेवढाच कडकडाट.

आहे की नाही मस्त जुगलबंदी.

 

अजून एक करायचं वरिष्ठांनी जेष्ठत्वाकडे जातांना, आपल्या नकळत आपल्या बाबतीत चार गोष्टी घडतात,

शिंक, खोकला, उचकी

आणि

सल्ला!

 

हा सल्ला देणं थांबवायचं.

त्या आधी समोरच्या व्यक्तीची भावना ओळखायची आणि मग ठरवायचं सल्ला द्यायचा का नाही ते.

” You Mirror My Emotions “

हे वाक्य सतत लक्षात ठेवायचं.

 

डॉक्टरांचं पुढचं विवेचन फार महत्त्वाचं होतं.

” नॉस्टॅल्जिया हा अविभाज्य भाग आहे या वाढत्या वयात. पण हा Nostalgia Process of Cheering असा असावा.

कसा नसावा,

तर Toxic Nostalgia म्हणजे,

वाक्याची सुरूवातच,आमच्या वेळी…

आणि,

” तुम्हाला काय त्याचं “

अशी नसावी.

 

ज्ञानेश्वर महाराजांचा एक

शब्द, ‘ सहनसिध्दी ‘ हा अखंड लक्षात ठेवायचा म्हणजे जेष्ठत्व मुरतं आणि वृध्दत्व परिपक्व होत जातं.

 

कार्यक्रम संपता संपता एका भारतीय फिलॉसॉफर यांचं वाक्य डॉ. आनंद यांनी सांगितलं, ‘ Only Body has DOB & DOD, otherwise it is all Legacy! ‘

 

या वाक्याला अनुसरून मंगला खाडीलकरांनी शांता शेळके यांच्या कवितेच्या ओळी जुगलबंदीत गुणगुणल्या..

 

त्या आठवण्यासाठी आता मंगलाताईंचा फोन नंबर शोधणं किंवा शांता शेळके यांचा कविता संग्रह, हा नवीन अभ्यास सुरू करायचा आहे.

 

डॉक्टरांचं ऐकलं पाहिजे. मला ही पोचायचं आहे, वरिष्ठ नागरिक ते जेष्ठ नागरिक या पदापर्यंत अभ्यास करत करत!

लेखक: श्री. विश्वास बीडकर

प्रस्तुती: श्री मिलिंद जांबोटकर

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ “निदान एक तरी झाड…” लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुति – सौ. उज्ज्वला केळकर ☆

श्रीमती उज्ज्वला केळकर

? वाचताना वेचलेले ?

☆ “निदान एक तरी झाड…” लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुति – सौ. उज्ज्वला केळकर

पहाटेच जाग आली

कोणी टकटक करीत होते,

दार उघडून पाहिले बाहेर

तर कुणीच उभे नव्हते…

*

आवाजाच्या दिशेने बघताच

खिडकीवर दिसला एक पक्षी,

चोचीने टकटक करीत तावदानावर

उमटवीत होता नक्षी…

*

“का रे बाबा? ” विचारले तर म्हणाला,

“भाड्याने मिळेल का एखादे झाड

घरटे बांधण्यासाठी?

एकटा कुठेही कसाही राहिलो असतो

पण जागा हवी

पिल्लांसाठी…

*

तुमच्या भाऊबंदांनी लुटले

आमचे रान केले निर्वासित,

बेघर झालोच दाण्यापाण्यासाठी

असतो आता फिरस्तीत…

*

वर पुण्यं म्हणून ठेवतात गच्चीत

थोडे दाणे अन पाणी,

पण निवाऱ्याचे काय?

हे लक्षात घेतच नाही कुणी…

*

पोटाला हवेच, खातो ती भीक

अन् नेतो थोडे घरी,

खायला तर हवंच,

जरी डोक्यावर छप्पर नसले तरी…

*

कधीकधी वाटते करावी आत्महत्या

बसून विजेच्या तारेवर,

किंवा द्यावा जीव लोटून

त्या उंच मोबाईल टाॅवरवर…

*

जसे मग आत्महत्येनंतर

सरकार काही देते शेतक-याला,

तसेच मिळेल का एखादं झाड

माझ्या पिल्लांना तरी आस-याला? “

*

ऐकून मी चक्रावलो, खरंच

एवढा विचार मी नव्हता केला,

जंगलतोडीत त्यांच्या घरांचा

विचार कुठेच नाही झाला…

*

मी हात जोडून म्हटले,

“त्यांच्या वतीने मी तुझी माफी मागतो,

पण आत्महत्या करू नको

खरंच मनापासून सांगतो…

*

तोपर्यंत कुंडीतल्या रोपावर

बांध वनरुम किचन खोपा,

अडचण होईल पण आत्ता तरी

एवढाच उपाय आहे सोपा… “

*

तो म्हणाला, “खूप उपकार होतील,

पण भाडे कसे देणार? “,

“रोज त्रिकाळ मंजुळ गाणी ऐकव,

बाकी काही नाही मागणार… “

*

तो म्हणाला, “मला तुम्ही भेटलात

पण बाकी नातलगांचं काय? ,

त्यांना पण घरट्यासाठी जागा हवी,

कुठे ठेवतील पाय…? “

*

“अरे लावताहेत आता झाडे

अन जगवतात आता कुणी कुणी,

बदलतेय चित्र हळू हळू, त्यांना सांग

आत्महत्या करू नका कुणी… “

*

ऐकून तो पक्षी उडाला

काड्या जमवायला घरट्यासाठी,

अन मी पण मोबाइल उचलला

तुम्हा सगळ्यांना हे सांगण्यासाठी…

*

त्याची खिडकीवरची टकटक

माझ्या मनाचे उघडले कवाड,

वाचून तुम्ही पण लावाल ना

कुंडीत वा अंगणात एकतरी झाड…

निदान एक तरी झाड!

* * * *

लेखक: अज्ञात

प्रस्तुती: सौ. उज्ज्वला केळकर

संपर्क – निलगिरी, सी-५ , बिल्डिंग नं २९, ०-३  सेक्टर – ५, सी. बी. डी. –  नवी मुंबई , पिन – ४००६१४ महाराष्ट्र

मो.  836 925 2454, email-id – kelkar1234@gmail.com 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ शांत मन… – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – सौ. मीनल केळकर ☆

सौ. मीनल केळकर

📚 वाचताना वेचलेले 📖

☆ शांत मन… – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – सौ. मीनल केळकर ☆

एकदा एका शेतकऱ्याला जाणवले

की त्याचे हातातील घड्याळ धान्याच्या

कोठारात हरवले आहे.

जरी ते एक सामान्य घड्याळ होते, तरी त्याचे लेखी त्याला अफाट भावनिक मूल्य होते.

बराच वेळ गवतात सर्वत्र

शोधल्यावरही त्याला ते सापडेना.

 

 मग त्यांनी कोठाराच्या बाहेर खेळत असलेल्या मुलांच्या गटाला घड्याळ शोधण्यासाठी बोलावले. त्याने त्या मुलांना वचन दिले की जो कोण त्याचे घड्याळ शोधून देईल, त्याला बक्षीस मिळेल.

बक्षीस मिळेल, हे ऐकून सगळी मुले

कोठारात लगबगीने गेली, गवताच्या चारी बाजूने शोधायला लागली. पण त्यांना घड्याळ कुठेही सापडेना.

नेमके जेव्हा त्या शेतकऱ्याने घड्याळाचा शोध घेण्याचे थांबवायचे ठरवले, तेव्हा एक मुलगा त्याच्या जवळ जाऊन

शेतकऱ्याकडे घड्याळ शोधण्याची एक संधी मागू लागला.

शेतकरी त्याच्याकडे बघून विचार करू लागला की ‘बिघडले कुठे…!

हा मुलगा प्रामाणिक दिसतोय.

देऊ या त्याला एक संधी……. ‘

शेतकऱ्याने त्या छोट्या मुलाला घड्याळाचा

शोध घेण्यासाठी कोठारात पाठवले.

 

थोड्याच वेळात तो मुलगा हातात घड्याळ

घेऊन नाचत नाचतच बाहेर आला.

शेतकऱ्याला आनंद झाला

आणि आश्चर्यही वाटले………!

त्याने त्या मुलाला विचारले

की जिथे बाकीच्यांना अपयश आले,

तिथे त्याला हे यश कसे काय प्राप्त झाले?

 

मुलगा म्हणाला, “मी काहीच नाही केलं,

फक्त जमिनीवर शांत बसून राहिलो आणि ऐकू लागलो.

त्या शांततेत मला घड्याळाची टिक-टिक ऐकू आली आणि मी त्या दिशेने शोधू लागलो. ”

 

एक शांत मन त्रासलेल्या मनापेक्षा चांगलं विचार करू शकते.

तुमच्या मनाला रोज काही क्षणांसाठी तरी शांतता द्या आणि मग पहा,

तुमच्या अपेक्षेप्रमाणे तुमचे मन तीक्ष्णपणाने काम करून तुमचं जीवन कसं सजवेल!

लेखक:अज्ञात

प्रस्तुती: सौ. मीनल केळकर

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ नियंत्रण सोडा… कवी : अज्ञात ☆ प्रस्तुती – श्री. मंगेश जांबोटकर ☆

श्री मंगेश जांबोटकर

📖 वाचताना वेचलेले 📖

☆ नियंत्रण सोडा… कवी : अज्ञात ☆ प्रस्तुती – श्री. मंगेश जांबोटकर ☆

एका संध्याकाळी, नवरा दरवाजातूनच सहज म्हणाला, “ऐक ना, मी थोडा वेळ मित्रांसोबत बाहेर जातोय. ”

कपडे घड्या घालत बसलेली त्याची पत्नी फक्त वर पाहत म्हणाली, “ठीक आहे. मजा करा. ”

तो थोडा चकित झाला. नेहमी ती त्याला “लवकर परत ये, सावधपणे गाडी चालव, उशीर करू नको”—असे काहीतरी सांगायची. पण त्या दिवशी काहीच नाही — ना सुस्कारा, ना प्रश्न, फक्त शांत “ठीक आहे. ”

काही तासांनी त्यांचा किशोरवयीन मुलगा किचनमध्ये आला. हातात एक कागद आणि चेहरा फिक्का.

आई, ” तो हळू आवाजात म्हणाला, “माझे मॉक परीक्षेचे निकाल आले… आणि ते खूप वाईट आहेत. ”

तो थिजून उभा राहिला, कारण त्याला नेहमीप्रमाणे ओरडा होईल, अशी खात्री होती. आईला त्याच्या अभ्यासाची खूप काळजी, म्हणून आज पुन्हा ‘वेळ वाया घालवला’, ‘क्षमता वाया घालवत आहेस’ अशी भाषणे ऐकायला मिळतील — अशी त्याची तयारी होती.

पण त्याऐवजी ती शांतपणे म्हणाली, “ठीक आहे. ”

तो विस्फारलेल्या डोळ्यांनी म्हणाला, “फक्त… ठीक आहे? ”

“हो, ” ती प्रेमाने म्हणाली. “जास्त अभ्यास केलास, तर पुढच्या वेळी चांगले होईल. नाही केला तर सेमिस्टर रिपीट करावा लागेल. तुझा निर्णय. मी दोन्ही परिस्थितीत तुझ्या पाठीशी आहे.”

तो हैराण झाला. आई एवढी शांत कधी झाली?

दुसऱ्या दिवशी दुपारी त्यांची मुलगी घाबरतच घरात आली. हॉलमध्ये थोडं थबकून ती म्हणाली, “आई… मी… मी कारला धडक दिली. फार मोठं नाही, पण डेंट पडलाय.”

आई ना ओरडली, ना रागावली, काहीच नाही. ती फक्त म्हणाली, “ठीक आहे. उद्या गाडी वर्कशॉपमध्ये देऊन टाक. ”

मुलगी थिजलीच. “तुला… राग नाही? ”

आईने मंद स्मित केले. “नाही. रागावल्यानं कार परत नीट होणार नाही. पुढच्या वेळी जपून चालव. ”

आता घरातील सगळेच चिंतित झाले. ही स्त्री — त्यांची पत्नी, त्यांची आई — पूर्वीसारखी राहिली नव्हती. ती कधी तापट, पटकन तणावात येणारी, पटकन बोलून जाणारी होती. आता मात्र शांत, स्थिर, अगदी प्रसन्न दिसत होती.

ते एकमेकांत कुजबुजायला लागले — काही बिनसले आहे का? तब्येत बरी नाही का? काही घडले आहे का?

शेवटी त्या संध्याकाळी, सगळ्यांनी तिला किचनच्या टेबलाजवळ बसवले.

“ऐक, ” नवरा म्हणाला, “तू अलीकडे खूप बदलली आहेस. काहीही होतंय, तरी तुझा राग येत नाही, तू प्रतिक्रिया देत नाहीस. सगळं ठीक आहे ना? ”

ती त्यांच्या चेहऱ्यांकडे पाहत हसली.

“काहीच बिनसलं नाही, ” ती म्हणाली, “सगळं अगदी योग्य चाललंय. मला फक्त एक गोष्ट समजली आहे. ”

ते सगळे शांत झाले.

“खूप वर्षांनी लक्षात आलं, ” ती म्हणाली, “की प्रत्येकजण स्वतःच्या आयुष्यासाठी स्वतःच जबाबदार असतो.

नवऱ्याने भुवया उंचावल्या. “काय म्हणायचंय तुला? ”

ती हात जोडून म्हणाली, “मी आधी प्रत्येक गोष्टीची चिंता करायची. तू उशीर केलास तर काळजी, मुलांचे मार्क कमी आले तर अपराधीपणा, काही तुटलं तर राग, कुणी नाराज झालं तर ते ठीक करण्याची धडपड. मी सगळ्यांच्या समस्या माझ्या मानायचे. पण एक दिवस लक्षात आलं — माझ्या काळजीने त्यांची समस्या सुटत नाहीत. फक्त माझी शांतता नष्ट होते. ”

मुलगी शांतपणे ऐकत होती.

ती पुढे म्हणाली, “माझ्या तणावाने तुम्हाला काही फायदा होत नाही. माझी धडपड तुमचं आयुष्य सोपं करत नाही — फक्त माझं कठीण करते. मी तुम्हाला सल्ला देऊ शकते, प्रेम देऊ शकते, साथ देऊ शकते. पण तुमचं आयुष्य मी तुमच्यासाठी जगू शकत नाही. तुम्ही घेतलेल्या निर्णयांचे परिणाम तुम्हालाच भोगावे लागतात — चांगले असोत वा वाईट. ”

ती क्षणभर थांबली आणि पुन्हा हसली. “म्हणून मी ठरवलं — जे माझ्या नियंत्रणात नाही ते नियंत्रित करण्याचा प्रयत्नच मी करणार नाही. ”

मुलगा पुढे झुकत विचारला, “म्हणजे… तुला आमच्याबद्दल काहीच वाटत नाही? ”

ती डोके हलवत म्हणाली, “अगदी वाटतं. पण चिंता करणे आणि नियंत्रण ठेवणे यात फरक असतो. मी तुमच्यावर माया करू शकते, पण त्यासाठी माझी शांतता हरवू नये.”

घरात शांतता पसरली.

ती तिघांकडे प्रेमाने पाहत म्हणाली, “माझं काम — तुम्हांला प्रेम देणं, मार्गदर्शन करणं, आणि गरज पडली की तुमच्या पाठीशी उभं राहणं. पण तुमचं काम — स्वतःचं आयुष्य स्वतः हाताळणं. निर्णय घेणं. त्यांचे परिणाम भोगणं. तसंच, प्रत्येकजण मोठा होतो. ”

ती शांतपणे मागे रेलून म्हणाली, “म्हणून आता काही चुकीचं झालं, तरी मी स्वतःला आठवण देते — हे मी दुरुस्त करण्यासारखं नाही. मी शांत राहीन. तुम्ही यातून शिकाल यावर विश्वास ठेवेन. कारण जीवन असंच असतं — धडे शिकवतं. ”

थोडा वेळ घरात संपूर्ण शांतता होती. वातावरण मात्र बदललं होतं.

नवऱ्याने तिचा हात हातात घेत म्हटलं, “तू आज आम्हा सगळ्यांना काहीतरी शिकवलंस. ”

ती हसली. “आसेल कदाचित. पण हे मला स्वतःलाच आधी शिकावं लागलं. ”

त्या रात्री सगळ्यांनी तिच्या शब्दांवर विचार केला.

मुलगा पुन्हा अभ्यासाला बसला — आई ओरडली म्हणून नाही, पण जबाबदारी त्याची आहे, हे त्याला जाणवलं म्हणून. मुलीने स्वतःच कारची दुरुस्ती ठरवली आणि इन्शुरन्सची प्रक्रिया समजून घेतली. नवरा पुढच्या वेळी बाहेर जाताना स्वतःहून फोन करून सांगू लागला — कारण ती सक्ती करत होती म्हणून नाही, तर त्याला तसं करावंसं वाटलं म्हणून.

आणि हळूहळू घर हलकं वाटू लागलं.

कोणीही भीतीने नाही तर समजुतीने वागू लागले. कोणीही कशावर ओरडा होईल, या कल्पनेने दडपून राहत नव्हते.

कारण घरातला एका जरी माणसाने शांतता स्वीकारतो, तरी ती शांतता सगळ्यांत पसरत जाते.

एक जण नियंत्रण सोडतो, आणि बाकी लोक स्वतःला नियंत्रित करायला शिकतात.

आणि अशा प्रकारे — शांतता संसर्गासारखी पसरते.

 ☆ ☆ ☆ ☆

लेखक : अज्ञात

प्रस्तुती : श्री. मंगेश जांबोटकर

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares