मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ ‘एवढे दे पांडुरंगा…’ – कवी : श्री. सुरेश भट ☆ प्रस्तुति – श्री मनोहर जांबोटकर ☆

श्री मनोहर जांबोटकर

? वाचताना वेचलेले ?

☆ ‘एवढे दे पांडुरंगा…’ – कवी : श्री. सुरेश भट ☆ प्रस्तुति – श्री मनोहर जांबोटकर

माझिया गीतात वेडे

दु:ख संतांचे भिनावे;

वाळल्या वेलीस माझ्या

अमृताचे फूल यावे !

*

आशयांच्या अंबरांनी

टंच माझा शब्द व्हावा;

कोरडा माझा उमाळा

रोज माधुर्यात न्हावा !

*

स्पंदने ज्ञानेश्वराची

माझिया वक्षांत व्हावी;

इंद्रियांवाचून मीही

इंद्रिये भोगून घ्यावी !

*

एकनाथाने मलाही

बैसवावे पंगतीला;

नामयाहाती बनावे

हे जिणे गोपाळकाला !

*

माझियासाठी जगाचे

रोज जाते घर्घरावे;

मात्र मी सोशीन जे जे

ते जनाईचे असावे !

*

मी तुक्याच्या लोचनांनी

गांजल्यासाठी रडावे;

चोख वेव्हारात माझ्या

मी मला वाटून द्यावे !

*

ह्याविना काही नको रे

एवढे दे पांडुरंगा !

ह्याचसाठी मांडीला हा

मी तुझ्या दारात दंगा !

*

कवी: सुरेश भट (रंग माझा वेगळा)

प्रस्तुती :श्री मनोहर जांबोटकर

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ चमचमीत तोंडीलावणी – कवयित्री: सौ. विद्या विष्णू वेलणकर ☆ प्रस्तुती – सौ. सुचिता पंडित ☆

सौ. सुचिता पंडित

? वाचताना वेचलेले ?

☆ चमचमीत तोंडीलावणी – कवयित्री: सौ. विद्या विष्णू वेलणकर ☆ प्रस्तुती – सौ. सुचिता पंडित ☆

फोडशी भारंगी आणि तेरे अळू

आषाढात खाल्ले हळू हळू

*

केनी कुरडू शेवगा आणि टाकळा

श्रावणात खाऊन करू मोकळा

*

भेंडी पडवळ दोडका आणि गवार

भाद्रपद अश्विनात याचाच भडिमार

*

भोपळे महाराज कार्तिकात फोडू

वांगी आणि मुळा जोडीला काढू

 *

कडवे कुळीथ चवळीचे गावातच शेत.

मार्गशीर्षात उसळ कळणाचाच बेत

*

फणसाच्या कुयरीची भाजी

पौषातच खायची

दारातील तोंडली शेंगा हिरवी केळी

जोडीला काढायची

 *

माघ फाल्गुनाला काय

असं म्हणू नका

चिने कणगी कांदे सुरण.

दारातच आहे केळीचा कोका.

*

चण्याची उसळ आणि आंबा डाळ

याची मजा चैत्रात फार

वैशाखाची मजाच आगळी

उकडगरे आणि आमरस प्रत्येकवेळी

*

पावसाळ्याची बेगमी करून

उरलं सुरलं जेष्ठात संपवू

वर्षभर बाजारात गेलोच नाही

आमचं काही अडलं नाही

*

कोकणच्या गृहिणी आम्ही हुषार

टोमॅटोची दादागिरी

नाही चालू देणार नाही चालू देणार!

कवयित्री: सौ. विद्या विष्णु वेलणकर

प्रस्तुती :सौ. सुचिता पंडित

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ एक दिवस असाही… – कवी : श्री शिरीष मोराणकर ☆ प्रस्तुती – सौ. प्रज्ञा गाडेकर ☆

सौ. प्रज्ञा गाडेकर

? वाचताना वेचलेले ?

⭐ एक दिवस असाही… – कवी : श्री शिरीष मोराणकर ☆ प्रस्तुती – सौ. प्रज्ञा गाडेकर ⭐

*

एक दिवस असाही

उनाड होऊन उजाडावा

सकाळ दुपार संध्याकाळचा

कुठलाच मेळ नसावा

*

घड्याळाच्या गजराचीही

कट्टी तेव्हा असावी

कितीही वाजले तरी

चादरीची घडी नसावी

*

तास मिनीट सेकंदाशी

कुठलाही मेळ नसावा

उगवणारा प्रत्येक क्षण

आळसावलेलाच असावा

*

घरभर सारा पसारा

मस्तपैकी पसरावा

घडीविनाच वाचलेला

पेपर समोर असावा

*

स्नानाआधीच पदयात्रा

कोपऱ्यापर्यंत घडावी

झणझणीत मिसळ

येताना उदरी रिचवावी

*

न कळवताच ऑफीसला

सरळ दांडी मारावी

बाॅसच्या चेहऱ्यावर

खुश्शाल फुली मारावी

*

घरच्याच कपड्यांमधे मग

बाईकवरून भटकावं

गावाबाहेरच्या धाब्यावर

पोटभर हादडावं

*

जमलंच तर मित्रांसोबत

दोन घटका बसावं

एखादा रमीचा डाव टाकून

गप्पांमधे डुबकावं

*

रोजच्या सगळ्या चिंतांना

एक दिवस विसरावं

कानात वारा गेलेल्या वासरागत

हवं तसं हुंदडावं

*

रोजच्या आखीव रुटीनचं

रेखीव वळण विसरावं

एक दिवस उनाड होऊन

जगण्याचं टाॅनिक मिळवावं

कवी: श्री शिरीष मोराणकर

प्रस्तुती: सौ. प्रज्ञा गाडेकर

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ “निवृत्तीनंतर…” – कवी : अज्ञात ☆ प्रस्तुती – श्री कमलाकर नाईक ☆

श्री कमलाकर नाईक

?  वाचताना वेचलेले  ? 

☆ “निवृत्तीनंतर…” – कवी : अज्ञात ☆ प्रस्तुती – श्री कमलाकर नाईक ☆

पहाटे उठावे स्वतः चहा करावा

झोप मोडेल असा आवाज नसावा

*

प्राणायाम करावा योग साधावा

हाडे मोडतील इतपत तो नसावा

*

फिरायला जावे प्रमाणात असावे

सोबत मोबाईल खिशात असावा

पडाल कोठे तर नक्की सापडाल

आंघोळीला तुमचा नंबर शेवटचा

न रागावता गोड मानून घ्यावा

*

किराणा भाजी पोस्ट बँक

फिरणे समजून आनंद घ्यावा

*

ज्येष्ठ मंडळीचा कट्टा असावा

पण त्यात कुठला वाद नसावा

मनमुराद गप्पांचा आनंद घ्यावा

*

लिहीणे वाचणे वाजवणे गाणे

एखादा तरी छंद नक्की असावा

*

मी कोणी मोठा होतो हे विसरा

मोठेपणाची झुल खुंटीवर ठेवा

मित्रमंडळी सगे सोयरे नातीगोती

लक्षात ठेवा हीच कामाला येती

*

आता काय राहलंय? म्हणू नका

कुणाला उपदेश करत सुटू नका

पर्यटन चित्रपट नाटक

राहुन गेले असेल तर उरका

पत्नीला सोबत घ्या विसरु नका

*

प्रकृती आणि पैसा येती कामा

या दोघांना सांभाळून ठेवा

*

संध्याछाया भिववती हृदया

हे विसरण्याची साधावी किमया

☆  

कवी: अज्ञात

प्रस्तुती : श्री कमलाकर नाईक

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ ’स्त्रिया आणि पुरुष…’ – लेखक : मधुकर क्षीरसागर ☆ प्रस्तुती – श्री अमोल अनंत केळकर ☆

श्री अमोल अनंत केळकर

 

? वाचताना वेचलेले ?

☆ ’स्त्रिया आणि पुरुष…’ – लेखक : मधुकर क्षीरसागर ☆ प्रस्तुती – श्री अमोल अनंत केळकर ☆ ☆

स्त्रिया हुशार असतात तरीही त्या दुःखी का राहतात?

त्यांच्या दु:खा मागील ७ विचित्र सत्यं वाचा…!

१ ‘ती’ काटकसर करून…! बचतीवर विश्वास ठेवते.

२ तरीही ‘ती’ महागडे महागडे कपडे खरेदी करते.

३ महागडे महागडे कपडे विकत घेते, तरीही ‘ती’ माझ्याकडे घालायला काही नाही, असे म्हणत राहते.

४ घालायला काहीच नाही, असे म्हणते, तरीही तिच्या कपाटात एक इंचही जागा नसते…!

५ तिचे कपडे खूप सुंदर असतात, परंतु कधीही ‘ती’ समाधानी नसते.

६ ‘ती’ कधीही समाधानी नसते, पण… नेहमी तिच्या पतीने तिची स्तुती करावी, असे तिला वाटते.

७ तिच्या नवऱ्याने तिची स्तुती करावी असे वाटते, पण जर तिचा नवरा ‘खरोखरच तिची स्तुती’ करत असेल तर ‘ती’ विश्वास ठेवत नाही.

थोडक्यात… काय?

स्त्रिया ‘भेंडी’ सारख्या असतात… आणि म्हणूनच त्यांचं कोणाशीही जमत नाही!

पुरुष नेहमी आनंदी का असतात?

त्याचीही ७ कारणे दिली आहेत.

१ त्याचे फोनवर ‘३० सेकंदात’ बोलणे संपते.

२ पाच दिवसांच्या सहलीसाठी ‘एक पँट पुरेशी’ असते.

३ निमंत्रण नसले तरी ‘मैत्री पक्की’ असते…!

४ संपूर्ण आयुष्यासाठी ‘एकच केशरचना’ (महत्त्वाचा मुद्दा).

५ कोणत्याही प्रकारच्या ‘खरेदीसाठी त्याला २० मिनिटे’ पुरेशी असतात.

६ इतरांच्या कपड्यांचा ‘मत्सर करत नाहीत’ (दुसरा महत्त्वाचा मुद्दा).

७ कोणताही ‘आडमुठेपणा’ नाही, ‘साधी जीवनशैली’… आज परिधान केलेला शर्ट उद्याच्या र्टीसाठीही काम करतो!

(अति महत्त्वाची बाब).

थोडक्यात,

पुरुष हा ‘टोमॅटो’ सारखा आहे… कोणत्याही भाजीत ‘मिसळून आनंदी’ राहतो!

लेखक: श्री. मधुकर क्षीरसागर

प्रस्तुती :श्री अमोल केळकर

बेलापूर, नवी मुंबई, मो ९८१९८३०७७९

poetrymazi.blogspot.in, 

kelkaramol.blogspot.com  

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ १४० वर्षे कसे जगावे? – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – सौ. दीप्ती गौतम ☆

सौ. दीप्ती गौतम

📖 वाचताना वेचलेले 📖

☆ १४० वर्षे कसे जगावे? – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – सौ. दीप्ती गौतम

एखाद्या वापरकर्त्याने ChatGPT ला विचारले— “मी १४० वर्षे कसे जगू शकतो?”

उत्तर साधे होते आणि अनपेक्षितही.

ChatGPT ने “ब्लू झोन्स” मधील दीर्घायुषी लोकांचा डेटा विश्लेषित केला आणि स्पष्ट निष्कर्ष मांडला:

मुद्दा आहाराचा नाही,

मुद्दा व्यायामाचा नाही,

मुद्दा अनुवंशिकतेचाही (genetics) नाही.

दीर्घायुष्याचा सर्वात महत्त्वाचा घटक: कमी प्रमाणातील दीर्घकालीन ताण (chronic stress).

उर्वरित सर्व गोष्टी दुय्यम!

तुम्ही कितीही चांगलं खाल्लं, व्यायाम केला, धूम्रपान टाळलं तरी —

जर तुम्ही सतत तणावाखाली जगत असाल, तर अकाली मृत्यू निश्चित आहे.

क्रॉनिक स्ट्रेस म्हणजे फक्त कामाचा ताण नाही.

तो तुमच्या खऱ्या व्यक्तिमत्त्व आणि तुम्ही जगाला दाखवता त्या “आवृत्ती” यांच्यातील अंतर्गत संघर्ष आहे.

तुम्ही आपल्या मनासारखे न जगता जबरदस्तीचे जीवन जगलात तर शरीर २४ तास “survival mode” मध्ये राहते.

वाढलेला कॉर्टिसोल शरीरातील रक्तवाहिन्या, रोगप्रतिकारक शक्ती आणि मेंदू — सर्व नाश करतो.

ओकिनावा, सार्डिनिया आणि इतर ब्लू झोन्समधील लोक जास्त जगतात कारण ते मासे खातात म्हणून नव्हे—

तर ते स्वतःशी शांततेत, समतोलात, समाधानी राहतात म्हणून.

 

दीर्घायुष्याचा पहिला नियम:

“ज्या गोष्टी तुमच्या अंतरात्म्याला विरोध निर्माण करतात, त्या करू नका. ”

नको असलेली नोकरी फक्त पैशासाठी करताय? → −१५ वर्षे

ज्याच्यावर प्रेम नाही अशा व्यक्तीसोबत भीतीपोटी राहात आहात? → −१० वर्षे

तुमची ऊर्जा शोषून घेणाऱ्या लोकांसोबत राहता? → −८ वर्षे

दररोज विषारी वातावरणात राहणे = पेशींचे झपाट्याने वृद्धत्व.

 

दुसरा नियम:

“जीवन पुढे ढकलणे थांबवा. ”

बहुतेक लोक असे म्हणतात— “निवृत्त झाल्यावर जगू…”

पण तेव्हा शरीर थकलेले, आजारी आणि ऊर्जाहीन असते.

ChatGPT च्या विश्लेषणानुसार—

४३% लोक निवृत्तीनंतरच्या पहिल्या ५ वर्षांतच मृत्यू पावतात.

का?

कारण शरीराने आयुष्यभर ‘जगण्याची परवानगी’ मिळण्याची वाट पाहिली… आणि जेव्हा ती मिळाली, तेव्हा खूप उशीर झाला होता.

 

तिसरा नियम: सामाजिक नाती — जीवनवर्धक औषध

एकटेपणा = दररोज १५ सिगारेट ओढण्याइतका घातक.

मजबूत सामाजिक नातेसंबंध असलेले लोक ५०% अधिक जगतात.

येथे मित्रांची संख्या नव्हे— नात्यांची गुणवत्ता महत्त्वाची.

 

चौथा नियम: स्वतःपेक्षा मोठा उद्देश शोधा.

जपानमध्ये याला इकिगाई म्हणतात —

“दर सकाळी उठण्याचे कारण. ”

स्पष्ट उद्देश असलेल्या लोकांचे आयुष्य सरासरी ७ वर्षांनी वाढते.

हा ‘मोठा सामाजिक मिशन’ असायलाच हवा असे नाही—

तो बागकाम, नातवंडे, कला, सेवा, कोणालातरी मदत करणे… काहीही असू शकते.

महत्त्वाचे म्हणजे —

‘मी इथे एका कारणासाठी आहे, माझी गरज आहे, ‘ असे वाटणे.

 

पाचवा नियम: आरोग्याच्या “over-optimization” चा अतिरेक टाळा.

फिटनेसचे अति वेड असलेले लोकही कधी कधी कमी जगतात.

कारण: अति नियंत्रण = अति ताण = वाढलेला कॉर्टिसोल.

कॅलरी मोजणे, ‘वाईट अन्न’ याची भीती, प्रत्येक पावलावर लक्ष…

हे जीवन नाही— ही कैद आहे.

 

सहावा नियम: व्यायाम नव्हे— नैसर्गिक हालचाल.

ब्लू झोन्समधील लोक जिमला जात नाहीत.

ते चालतात, बाग सांभाळतात, शिड्या चढतात.

हालचाल त्यांच्या जीवनाचा भाग आहे, ‘वेगळा तासभराचा व्यायाम’ नाही.

 

निष्कर्ष: दीर्घायुष्याचं सर्वात मोठं रहस्य म्हणजे —

ताणमुक्त, नैसर्गिक, स्वतःशी प्रामाणिक जीवन.

कवी:अज्ञात

प्रस्तुती : सौ. दीप्ती गौतम

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ “निरपेक्ष दान…” – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – सौ. शशी नाडकर्णी-नाईक ☆

सौ. शशी नाडकर्णी-नाईक

? वाचताना वेचलेले ?

☆ “निरपेक्ष दान…” – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – सौ. शशी नाडकर्णी-नाईक 

शाळेत एके दिवशी शिक्षिकेने मुलांना सांगितलं, “आज आपण एका मुलाला नवीन बूट देणार आहोत. पण कोणाला द्यायचे हे ठरवणं माझ्यासाठी कठीण आहे. म्हणून आपण लॉटरी काढूया. ज्याचं नाव येईल त्याला हे बूट मिळतील. ”

सर्व मुलांनी आनंदाने आपल्या-आपल्या नावाचे छोटे कागद लिहून डब्यात टाकले.

शिक्षिकेने त्या कागदांचे तुकडे व्यवस्थित मिसळले आणि सगळ्या मुलांसमोर एक कागद उचलला.

कागद उघडताच त्यावर लिहिलं होतं, “अजय”.

सर्व मुलांनी टाळ्या वाजवल्या.

अजय हळूच उठला. त्याच्या डोळ्यातून आनंदाचे अश्रू वाहू लागले.

जुन्या, फाटलेल्या बुटांमुळे तो किती दिवस लाजिरवाणा होत होता, हे फक्त त्यालाच ठाऊक होतं.

वडिलांचं छत्र हरपलेलं, आई असहाय असायची … अशा परिस्थितीत नवीन बुटांचं हे बक्षीस त्याच्यासाठी सोन्यासारखं अमूल्य होतं.

त्या क्षणी वर्गात जणू सगळ्या मुलांच्याही डोळ्यात चमक दिसली.

पण शिक्षिकेला घरी गेल्यावर पतीसमोर ही गोष्ट सांगताना अश्रू थांबले नाहीत.

पतीने विचारलं – “अगं, आनंदाची गोष्ट आहे, मग रडतेस का?”

शिक्षिका हुंदके देत म्हणाल्या –

“मला अजयचे बूट पाहून नाही, तर बाकी मुलांच्या हृदयातलं ममत्व पाहून रडावंसं वाटतंय.

कारण जेव्हा मी डब्यातील उरलेले कागद उघडले…

त्यावर सगळीकडे फक्त एकच नाव होतं – अजय.

त्या लहानग्या मुलांनी अजयच्या चेहऱ्यावरचं दुःख, त्याची असहायता ओळखली आणि त्याच्या वाट्याला आनंद यावा म्हणून स्वतःचं नाव न लिहिता त्याचं नाव लिहिलं.

ती निरागस मुलं त्याच्या वेदना जाणून घेऊ शकली, पण मी त्याच्या डोळ्यांतील ती व्यथा ओळखू शकले नाही… याचं मला आयुष्यभर दुःख राहील! “

मित्रांनो, शिक्षणाची ताकद फक्त पुस्तकात किंवा वर्गात नसते,

ती मुलांच्या निर्मळ मनात आणि करुणेत दडलेली असते.

त्या निरागस मुलांनी जे शिकवलं, ते कदाचित कुठल्याही पाठ्यपुस्तकात सापडणार नाही –

खरा आनंद आपल्याला मिळालेल्या गोष्टींमध्ये नसतो, तर इतरांच्या चेहऱ्यावर आणलेल्या हास्यात असतो.

लेखक : अज्ञात 

प्रस्तुती : सौ. शशी नाडकर्णी-नाईक

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ ‘एक बापाचे निवेदन…’ – लेखक: श्री. आनंद दिवाकर काचरे ☆ प्रस्तुति – श्री मनोहर जांबोटकर ☆

श्री मनोहर जांबोटकर

? वाचताना वेचलेले ?

☆ ‘एक बापाचे निवेदन…’ – लेखक: श्री. आनंद दिवाकर काचरे ☆ प्रस्तुति – श्री मनोहर जांबोटकर

न चुकता रात्री झोपताना गाढ विश्वासाने आपल्या अंगावर हात टाकून झोपणारी मुलगी

“आजपासून एकटी झोपणार म्हणते” तेंव्हा ती मोठी होते….

**

शाळेत जाताना चिमुकल्या बोटांनी हात घट्ट धरणारी मुलगी आज रस्ता ओलांङताना दंड पकङून

“सांभाळून बाबा” असं म्हणते तेंव्हा ती मोठी होते…..

*

दोन केक आणि आईस्क्रिम खाऊन पण आपल्या वाटणीचा केक हक्काने खाणारी मुलगी आज

“बाबा एक घास हवा का? ”

विचारते तेंव्हा ती मोठी होते…..

*

जरासे लागलं की आपण मलम लावताना आजून जोराने रङणारी मुलगी आज “बाबा ङोकं दुखतय का? बाम लावू का? ” विचारते तेंव्हा ती मोठी होते……

*

चॉकलेटसाठी एक दोन रूपये हक्काने मागताना रडणारी मुलगी आज

“बाबा तुम्हाला पाहिजे तर माझ्या पिगी मधले पैसे घ्या” म्हणते तेंव्हा ती मोठी होते…….

*

मिकी माऊस आणि छोटा भीम बघण्यासाठी रिमोट हातात घट्ट धरणारी मुलगी आज “बाबा तुम्हाला बातम्या बघायच्या आहेत का? ” असं विचारते तेंव्हा ती मोठी होते…….

*

बाहेरगावी कामाला जाताना

‘बाबा जाऊ नको ना ssss’ म्हणत बॅग आत नेऊन लपवणारी मुलगी आज

“बाबा, तुमची बॅग भरू का, विचारते” तेंव्हा ती मोठी होते……

*

पटकन मोठी झालेली ती,

लग्न करून जाताना

“बाबा रङू नको” म्हणत स्वतः धाय मोकलुन रङते

तेंव्हा मात्र ती परत लहान होते…

तेंव्हा मात्र ती परत लहान होते…

**

शेवटच्या चार ओळीत सारे सामावले आहे. वेगळे अजून काय सांगू?

पण एक लक्षात ठेवा ग मुलींनो, तुम्ही म्हणजे बाबाच्या काळजाचा तुकडा असता. मुलावर प्रेम असेलही बाबांचे पण मुलीवर “जीव” असतो. म्हणूनच तुम्हीही त्याला जीवापाड जपा. त्याला तुमच्याकडून फार काही नको असतं. फक्त निखळ प्रेम हवं असतं. आणि त्या प्रेमापुढे जगातलं कोणतंही “सैराट” प्रेम हे फिकेच आहे. बाप होता म्हणून तर तुम्ही हे जग पाहू शकलात, या एका गोष्टीसाठी का होईना, त्या बाबाला तो कधी चुकलाच तर मन मोठे करून माफ करा.

लेखक : श्री आनंद दिवाकर काचरे

प्रस्तुती :श्री मनोहर जांबोटकर

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ सार्थक… – कवी: डॉ. श्रीकृष्ण जोशी ☆ प्रस्तुती -सौ. दीपा नारायण पुजारी ☆

सौ. दीपा नारायण पुजारी

 

? वाचताना वेचलेले ?

☆ सार्थक… – कवी: डॉ. श्रीकृष्ण जोशी ☆ प्रस्तुती – सौ. दीपा नारायण पुजारी ☆

काळीज किती गलबलले

हातांची थरथर बघता

तो भास्कर ऐन दुपारी

क्षणमात्र थांबला होता ll

*

हे भागधेय नियतीने

तव लिहिले होते भाळी

स्पंदने मनातील तुझिया

मग शोधू लागल्या ओळी ll

*

मंदिरी ध्वनी घंटांचे

जाणीव जागवित होते

शतकांच्या संघर्षाला

रुधिराचे शिंपण होते ll

*

कोटी कोटी हिंदु हृदयांना

ध्वज भगवा परम पवित्र

ती मने जोडण्यासाठी

मी झालो निमित्तमात्र ll

*

काही न येथले माझे

करुणाघन तुम्ही सारे

मी बिंदू सागरतळीचा

तुम्ही गगनामधले तारे ll

*

मन भरून आले जेव्हा

ध्वज गगना जाऊन भिडला

उद्घोष दशदिशांना गेला

जाहला स्पर्श क्षितिजाला ll

*

तम सरले दुर्दिन गेले

आनंद नव्या विश्वाला

जोडले हात थरथरले

हा देह सार्थकी झाला ll

कवी : डॉ. श्रीकृष्ण जोशी

प्रस्तुती : सौ. दीपा नारायण पुजारी

इचलकरंजी

फोन नं : 9665669148 ईमेल : deepapujari57@gmail.com

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ “नि:स्वार्थ दान…” – लेखिका : श्री गणेश केळकर ☆ प्रस्तुती – सौ.राधा पै ☆

सौ.राधा पै

? वाचताना वेचलेले ?

☆ “नि:स्वार्थ दान…” – लेखिका : श्री गणेश केळकर ☆ प्रस्तुती – सौ.राधा पै ☆

दान… हा शब्द जितका साधा, तितका तो प्रसंगानुरुप रूपं बदलतो.

कधी हात देतो,
कधी आधार देतो,
आणि कधी जिवंत राहण्याची ताकद देतो.

शाळेच्या पहिल्या दिवशी नवीन बॅग, नवीन वही, नवीन बॉक्स, ही गोष्ट काही मुलांसाठी नेहमीची आणि काही मुलांसाठी, स्वप्नासारखी.

एकदा एका शिक्षकाला दिसलं की वर्गातील छोटा दिनू नेहमी वहीच्या एका पानाच्या कोपऱ्यावरच लिहितो.

लिहायला सांगितलं की तो घाबरत म्हणायचा, सर, पान संपलं की आईस काय सांगू…?

दुसऱ्या दिवशी शिक्षकांनी कुणालाही न सांगता वर्गातील काही मुलांना पुस्तके, वह्या, पेन्सिली दिल्या. दिनूचा चेहरा पाहण्यालायक होता.

त्याने वह्या हातात घेतल्या आणि उद्गारला, “सर, आता मी मोठ्ठा निबंध लिहीन.” शालेय साहित्य दान म्हणजे फक्त वही देणं नाही. ते मुलाच्या आयुष्याला ‘रिकामं पान’ न ठेवता, लिहायला प्रवृत्त करणं.

पूर आला, भूकंप झाला, एखादं कुटुंब अचानक रस्त्यावर आलं, तेव्हा दान म्हणजे फक्त पैशाचा विषय नसतो, तो वेळेचा आणि उपस्थितीचा असतो. गावात पूर किंवा भूकंप येऊन घरं उध्वस्त झाली तेव्हा, गावातील सगळे एकदिलाने उभे राहिले.

मुलं घराबाहेर रडत होती.

आणि तेव्हा एक म्हातारी आजी आली आणि म्हणाली, “बाळांनो, चला, माझ्या घरात ऊब आहे. कपडेही आहेत. या आत या.” कपडे महाग नव्हते, घर मोठं नव्हतं.
पण त्या क्षणी वेळेला तिच्या त्या कृतीने इतका आधार दिला की जणू संकटाचं वादळ जाणवलंच नाही.

आपत्कालातील दान म्हणजे, संकटाशी दोन हात करणे.

औषधांचं दान म्हणजे शरीर वाचवणं, पण त्यापेक्षा महत्त्वाचं म्हणजे मनाला दिलासा देणं.

एकदा रुग्णालयात एका वृद्ध बाबांना महागडी औषधं लिहून दिली. पण महिना अखेर पेन्शन शिल्लक नव्हती.

ते औषधांच्या काऊंटरवर उभे राहून शांतपणे म्हणाले, “थोडं कमी देता येईल का? “

तेव्हा मागून कुणीतरी हात पुढे करून पूर्ण बिल भरलं.

तो माणूस नावही न सांगता निघून गेला. त्या वृद्धांचे डोळे पाणावले.

औषधाने शरीराला बळ मिळालं, आणि त्या अनोळखी व्यक्तीने दिलेल्या दयाळूपणाने मनाला.

औषधदान म्हणजे, तुम्ही जगलात तर आम्हा सर्वांचं चांगलं जगणं अधिक परिपूर्ण होणं, असा नि:शब्द संदेश.

गावात जत्रा भरते किंवा धार्मिक उत्सव असतो, त्यावेळी अन्नछत्र असतं. जेवण झाल्यावर म्हणजे प्रसाद भक्षण केल्यावर धन्यवाद म्हणू नये. यात आभार नसतात. तर यात आपलेपणा असतो.

आणि खरंच, जिथे एखादं लहान मूल प्रसादाचा द्रोण हातात घेऊन हसतं, जिथे एक वृद्ध ‘देवा, भरभराट होवो’ असं मनोमन आशीर्वाद देतो, तिथे देणाऱ्याला अचानक काहीतरी मिळाल्यासारखं वाटतं. अन्नदान म्हणजे फक्त पोट भरत नाही, माणुसकीही भरभरून वाहते.

‘अवयवदान, रक्तदान’ या शब्दांचा रोज टीव्हीवर, वर्तमानपत्रात उल्लेख असतो. पण त्यातली खरी ऊब कळते ती एखाद्या कुटुंबाच्या डोळ्यांतून. एकदा एका ओळखीच्या कुटुंबात दुर्दैवी घटना घडली.

पण त्या घरातील मुलाने शेवटच्या क्षणी आईचा हात हातात घेऊन शांतपणे सांगितलं, “आई, तुझं हृदय कुणाचातरी ठोका वाढवेल, तुझे डोळे कुणाचातरी पहाट उजळतील.”

त्या वाक्यानं घरभर शांतता दाटली. दुःख होतंच. पण त्यावर जीवनाचा सुगंधही मिसळला. अवयवदान हा कृतज्ञतेचा सर्वोच्च आकार.

कारण यात देणारा निघून जातो, पण त्याचं हृदय, त्याचे डोळे, त्याचा श्वास कुणाच्यातरी आयुष्यात चालत राहतो.

दान म्हणजे फक्त काहीतरी देणं नाही. दान म्हणजे मनातून निघालेली सहज कृती. कधी एखाद्याला पावसात छत्री देणं, कधी शाळेतल्या मुलाला पुस्तक देणं,

कधी वृद्धाश्रमात शांतपणे बसून ‘काय सांगताय? ‘ विचारणं, हे सगळंही ‘दान’च. कारण दानाचं मूळ एका छोट्याशा भावनेत असतं : ‘मी तुला माझ्यातलं थोडं देतो, कारण तू आणि मी वेगळे नाही.’

आपत्कालातला आधार, गरीब मुलांना दिलेलं साहित्य, गरजूंना केलेली मदत,  रुग्णांना दिलेली औषधं, ही सगळी वेगवेगळी रूपं आहेत, पण मूळ एकच आहे… माणुसकी.

दान करताना माणूस मोठा होत नाही,  तो फक्त स्वतःला अधिक मानवी बनवतो.

दान हा एक छोटासा शब्द, पण अर्थ मात्र आकाशाएवढा. त्यात प्रेम आहे, करुणा आहे, त्याग आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे सर्वांना सामावून घेण्याचे आपलेपण आहे. अन्नदानाने भूक भागते, अवयवदानाने ओआयुष्यच मिळतं.

एक जिवंत माणसाला ऊब देतं, दुसरं मृत्यूनंतरही अर्थ देतं. मात्र दोन्हींचा सूत्रधार एकच- ” माणुसकी. “

लेखक: श्री.गणेश केळकर

प्रस्तुती:सौ.राधा पै

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares