मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ Buy Nothing! … लेखिका : सुश्री ज्योती रानडे ☆ प्रस्तुती : श्री मिलिंद जांबोटकर ☆

📖 वाचताना वेचलेले 📖

☆ Buy Nothing! … लेखिका : सुश्री ज्योती रानडे ☆ प्रस्तुती : श्री मिलिंद जांबोटकर 

निशा कामाहून घरी येताना सायकलच्या दुकानात थांबली. तिच्या आठ वर्षाच्या मुलाला नवी सायकल घ्यायची होती. निळ्या रंगाची, गिअर असलेली फॅन्सी सायकल व हेल्मेट घ्यायचं होतं. पण दुकानातील अनेक प्रकारच्या महागड्या सायकली बघून ती गोंधळून गेली.

बॅास्टनजवळच्या एका छोट्या गावात तिनं व रविने संसार थाटला होता. दोघेही IT मधे काम करत होते. सेलवर गोष्टी आल्या, की पैसे वाचतात, म्हणून ती बऱ्याच गोष्टी घेऊन ठेवत असे. घरात हळूहळू करत इतकं सामान जमलं की कपाटं कमी पडत. पर्सेस, चपला, बूट, फ्लावरपॅाटस्, खरी व खोटी फुलं, फुलझाडे, पुस्तकं, कॉफी मेकर, कपडे, टोप्या, फ्रेम्स, खेळणी अशा हजारो गोष्टींनी घर भरून वाहत होतं.

ती सायकली बघत असताना दोन बायकांची कुजबुज तिच्या कानावर आली. एवढे पैसे पाच वर्षाच्या मुलाच्या सायकलवर नको टाकायला! ‘बाय नथिंग’कडे नक्की मिळेल लहान मुलांची सायकल. तिने कान टवकारले.. ती बाई म्हणाली की मुलगा जेव्हा मोठा होईल तेव्हाच मोठी सायकल घ्यावी.

तोपर्यंत ‘बाय नथिंग’!

तिने त्यांना ‘बाय नथिंग’हा काय प्रकार आहे, विचारलं. त्या म्हणाल्या, “हा पत्ता व फोन ‘बाय नथिंग’चा.. रिबेका भेटेल तिथे. ती सगळी माहिती देईल. “

निशा कुतूहलाने ‘बाय नथिंग’चा पत्ता शोधत गेली. एका ५० वर्षाच्या हसऱ्या चेहऱ्याच्या बाईनं तिचं स्वागत केलं.

“माझं नाव रिबेका. वेलकम टू बाय नथिंग! ” ती म्हणाली.

निशानं विचारलं “बाय नथिंग हा नक्की काय प्रकार आहे?”

रिबेका चष्मा नाकावर आणत म्हणाली,” हा फेसबुक ग्रूप मी व माझ्या मैत्रीणींनी सुरू केला. माझी सहा-सात वर्षांपूर्वी पैशाची फार चणचण होती. मी मला लागणाऱ्या गोष्टी कोणी काही काळापुरत्या देतील का, असं लोकांना विचारायला सुरूवात केली. अगदी जेवणसुध्दा दिलं लोकांनी! माझी परिस्थिती सुधारल्यावर मी हा ग्रूप जीवनावश्यक गोष्टींसाठी बनवला.

ह्या लोकल बाय नथिंग ग्रूपमध्ये हजाराहून जास्त मेंबर्स आहेत. मेंबरशिपसाठी अगदी नॅामिनल पैसे घेतात व काही प्रश्नांची उत्तरं द्यावी लागतात. तुम्हाला एखादी गोष्ट हवी असेल तर हजार लोकांमध्ये कुणाकडे तरी असतेच. ती गोष्ट वापरा व काम झालं की परत करा.

अजिबात काहीही खरेदी करण्याची जरूरी नाही. तुम्ही जी गोष्ट वापरत नसाल ती ज्याला हवी त्याला द्या आणि तुम्हाला हवी ती एखाद्याकडून घ्या. यानं पैसा तर वाचतोच; पण जगातील कचरा कमी होतो. पर्यावरण सुधारते, ओळखी होतात. पर्सनल हायजीनसाठी लागणाऱ्या गोष्टी फक्त विकत घ्या. आपल्या गावाचा हा जसा ग्रूप आहे तसे अनेक गावात हे ग्रूप आहेत. जवळजवळ १६ लाखाहून जास्त मेंबर्स आहेत सध्या! “

निशानं फेसबुक बाय नथिंग ग्रूप तिथेच जॅाईन केला व निळी, गिअरची सायकल आहे का, विचारले. लगेच ३०-४० उत्तरं व सायकलींचे फोटो आले. तिने त्यातून एक सायकल निवडली. सात गियरची! लोक एकमेकांची बेबी क्रिब्ज, बीच चेअर्स, व्हील चेअर्स, मुलांची खेळणी, पुस्तकं वगैरे हजारो गोष्टी एकमेकाकडून घेत होते. देवाण घेवाण एक पैसा न वापरता होत होती, त्यामुळे भांडणं नव्हती!

रिबेका म्हणाली, ”माणसांकडे लक्ष द्यायला शिकायचं. वस्तूवरचं प्रेम कमी करायचं! एवढं लक्षात ठेवायचं.”

‘हे विश्वची माझे घर’चा खरा अनुभव घेत तिनं निळी सात गिअरची सायकल घेतली व ती घरी आली. रवी थक्क झाला.

निशाच्या डोक्यात रिबेकाचे शब्द घुमत होते..

“कशासाठी जमवायचं एवढं? बरोबर थोडंच नेणार आहे?”

निशानं एक एक करत तिच्या संग्रही असलेल्या अनेक गोष्टी बाय नथिंग फेसबुक ग्रूप वर पोस्ट केल्या. अनेकांना त्या वापरायला द्यायला सुरूवात केली. आता तिच्या गावात बऱ्याच ओळखी झाल्या आहेत. विचारांची देवाण घेवाण होत आहे. भारतापासून लांब रहात असताना एखादी मावशी, काकू, दादा भेटत राहतात तिला हल्ली. नाती जुळत आहेत.

माणूस आयुष्यभर गोष्टी जमवत राहतो. जाताना यातलं काहीही बरोबर नेता येणार नाही हे माहीत असूनही! त्यापेक्षा स्नेह, मैत्री, दुवा जमवण्याचा तिनं निश्चय केला आहे!

आपणही ‘बाय नथिंग’ तत्त्व आचरणात आणूया ना?

Give something

Grow something

Create something

Donate something

Buy Nothing!

 

लेखिका: श्रीमती ज्योती रानडे

प्रस्तुती: श्री. मिलिंद जांबोटकर

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ “तरूणाई…” – लेखक: श्री श्रीरंग खटावकर ☆ प्रस्तुती – श्री सुनीत मुळे ☆

श्री सुनीत मुळे

📚 वाचताना वेचलेले 📖

☆ “तरूणाई…” – लेखक: श्री श्रीरंग खटावकर ☆ प्रस्तुती – श्री सुनीत मुळे ☆

मॉर्निंग वॉकला गेलो होतो. तळ्याला चार फेऱ्या मारल्यावर बसलो, तेवढ्यात बाजूने आवाज आला.

“काय रे मन्या, आज कवळी विसरलास का रे? “

खणखणीत आवाजातले हे वाक्य ऐकलं आणि गर्रकन मान वळवली. तळ्याच्या काठावर आठ दहा, सत्तर- ऐंशीच्या घरातले तरुण बसलेले, आणि बरमुडा आणि टी शर्ट घालून येणाऱ्या मन्याकडे बघून फिदीफिदी हसत होते.

मन्या त्यांना म्हणाला, ” हसा लेको. ज्याची जळते त्यालाच कळते. यु एस ला गेलो होतो, येताना कवळीच विसरलो. पाठवलीय मुलानं कुरियरनी पण अजून आली नाहीये. तीन दिवस झाले पेज खातोय. तुम्हाला काय होतंय खोटे दात काढायला. “

तेवढ्यात एक लेंगा आणि सदरा घातलेले आजोबा उठले आणि लटक्या रागानं म्हणाले, ” खोटे दात काय रे? हे बघ” म्हणत बोळकं उघडलं, तर टेडी बिअरसारखे दोन दात लुकलुकत होते, बाकी सगळं वाळवंट!

“दात दोनच असले तरी कडक बंदीचा लाडू खातो अजून. “

“खातोस की चघळतोस रे? “

ख्या ख्या, करून सगळे हसले.

“नान्या, चघळतोस तू लेका. काल घरी जाताना चार शेंगदाणे तोंडात टाकलेस, ते संध्याकाळी देवळात आलास तरी चघळतंच होतास. ह्ये ह्ये ह्ये. “

“हाट, ते साखरफुटाणे होते देवळातले! “

असे मस्त संवाद चालू होते.

मग नादच लागला मला रोज त्यांच्या गप्पा ऐकण्याचा.

जवळपास पाच सहा महिने झाले असतील, मला त्यांच्या गप्पा ऐकता ऐकता. पण कधी कोणाची कुरबुर ऐकली नाही.

फक्त नोटबंदी झाली त्यावेळेस, नाना तावातावाने भांडले होते, “शिंच्या त्या मोदीने माझं पितळ उघडे पाडलंन. बायको पासून लपवून ठेवलेले दोन हजार रुपये काढायला लाविलें हो. “

“मॅग, लपवायचे कशाला म्हणतो मी! मी बघ निघताना बायको पुढे रोज भिक्षांदेही करतो, ठेवते २०/२५ रुपये हातावर, तेवढीच आपली विडी काडीची सोय! काय? “

एक दिवस अचानक सगळाच्या सगळा ग्रुप गैरहजर!

त्यानंतर माझ्या कामामुळे मला दोन तीन दिवस जमलं नाही, चौथ्या दिवशी गेलो तर सगळे हजर!

त्यातल्या तात्यांना विचारलं, “काय हो परवा कोणीच आला नाहीत? “

तर थेट अंतु बर्व्या स्टाईल उत्तर नानांनी दिले, ” अरे, मन्याची ट्रान्सफर झाली ना! त्यालाच सोडायला गेलो होतो. “

“कुठे? “

“अरे कुठे म्हणून काय विचारतोस? स्वर्गात!

त्याच्या महायात्रेला गेलो होतो सगळे! “

“काही म्हणा. मन्या भाग्यवान हो! लेक अमेरिकेतून येतो काय, हाटीलात जाऊन पार्टी करतात काय, घरी येऊन झोपतो काय, आणि मुलगा उठवायला गेला तर हा मन्या केव्हाच गेलेला, स्वर्गाचं दार वाजवायला, रंभेच्या मागं! “

बाकी सगळे खिन्नपणे हसले.

मी म्हटलं, ” तात्या इतकं लाईटली घेताय? “

“अरे तू, आता आलास, आधी आम्ही सव्व्हीस जणं होतो, आता बाराच उरलोय! तेही ऐशी-नव्वदीचे! विकेटी पडायच्याच रे. आणि म्हणून रडायचं कशाला, दोन दिवस दुःख वाटतं, पण जन पळभर म्हणतील हाय हाय म्हणून सोडून देऊन आपलं रुटीन चालू करायचं! “

एकदम काहीसं आठवून मला म्हणाले, ” तू केटरिंग करतोस ना रे! तुझा नंबर दे, मन्याच्या मुलाला देतो, तेराव्याची ऑर्डर देईल तुला! “

मी डोक्याला हात लावला. ते बघून अजून एक आजोबा म्हणाले, ” अरे, आपल्या सगळ्यांच्याच मुलांना देऊया याचा नंबर. वर्षभरात अजून दोन-चार तरी विकेट पडणार! ” ख्या ख्या ख्या!

दोन दिवसांनी मी जरा घाईत होतो. तेवढ्यात तात्यांनी हाक मारली, ” ओ केटरर, जरा इकडे या, आज संध्याकाळची ऑर्डर घेणार का पार्टीची? “

“पार्टी? “

“अरे, नान्याच्या सेंच्युरीला फक्त अकरा वर्ष उरलीत! “

माझा प्रश्नार्थक चेहरा बघून मला म्हणाले, “एवढा कसा बावळट रे? आज नान्याचा एकूणनव्वदावा प्रकटदिन आहे.

फार काही नको. मस्तपैकी लुसलुशीत उपमा, आणि चहा. बारा प्लेट. “

“बास. एवढंच ना? दिलं! “

“आणि हो, कडक बुंदीचे पाच लाडू! आज बघतोच कसा खातो ते. आणि हो! उपमा जास्त तिखट नको हो, हिरड्या झोंबतात नंतर. आणि त्यात उडदाची डाळ बिलकुल नको, कवळीखाली जाऊन बसते, मग जीव जातो काढताना! “

संध्याकाळी ऑर्डर द्यायला गेलो आणि चकित झालो, सगळे थट्टा मस्करी करीत बसले होते. मन्याच्या फोटो समोर काही चाफ्याची फुलं होती, आणि मोठमोठ्यांदा गाणं चालू होतं.

“जिंदगी एक सफर है सुहाना, यहा कल क्या हो किसने जाना! “

मला बघून सगळे थांबले. तात्या पुढे झाले. उपम्याची मूद एकेका बशीत वाढून घेतली, चहा कपांत ओतला. सगळे उभे राहिले आणि “लॉंग लिव्ह नान्या, थ्री चिअर्स फॉर नाना, हिप हिप हुरर्रे, हिप हिप हुर्रे, हिप हिप हुर्रे! ” करत चहाचे कप, एकमेकांवर आदळून पुन्हा दुसरं गाणं सुरू!

मी काहीशा संभ्रमावस्थेत घरी आलो आणि विचार करू लागलो, आज आपण आपल्या कट्ट्यावर भेटतो, पण आपल्या आयुष्याच्या तिन्हीसांजेला असेच हसतमुख, इतकेच जिंदादिल असू का? ह्या म्हाताऱ्यांइतकीच तरुणाई आपल्यात असेल?

असायलाच हवी!

आणि एकदम त्यांच्या पार्टीतलं मी निघतानाचं गाणं ओठावर आलं,

“कल खेल में, हम हो न हो

गर्दिश में तारे रहेंगे सदा

भूलोगे तुम, भूलेंगे वो

पर हम तुम्हारे रहेंगे सदा

रहेंगे यहीं, अपने निशाँ,

इसके सिवा जाना कहाँ

जी चाहे जब हमको आवाज़ दो

हम हैं वहीं, हम थे जहाँ

अपने यहीं दोनों जहां

इसके सिवा जाना कहाँ

जीना यहाँ मरना यहाँ,

इसके सीवा जाना कहा! “

 

लेखक: श्री श्रीरंग खटावकर

प्रस्तुती: श्री सुनीत मुळे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ “चिपाड…” लेखिका: सौ. संगीता चव्हाण ☆ प्रस्तुति – सौ. उज्ज्वला केळकर ☆

श्रीमती उज्ज्वला केळकर

? वाचताना वेचलेले ?

☆ “चिपाड…” लेखिका: सौ. संगीता चव्हाण ☆ प्रस्तुति – सौ. उज्ज्वला केळकर

 — अस्तित्वाचा गहिरा क्षण

पानगळ आणि चिपाड — दोघंही जमिनीवर येतात. पण दोघांची कथा मात्र वेगळी असते.

पानगळीच्या पानाला कोणी हात लावलेला नसतो. त्याच्या आत एक ऋतू उतरतो, एक वेळ येते. ते आपली चक्रपूर्ती करून हळूहळू गळून पडतं. कुणी ते फेकलेलं मानत नाही. ते जमिनीशी एकरूप होतं.

पण चिपाड… ही गोष्ट वेगळी आहे. त्याला जाणीवपूर्वक हात लावून, आतला सारांश काढून घेतला जातो. रस उपसून घेतला जातो. मग उरलेलं निरुपयोगी मानून फेकलं जातं. चिपाड हे नैसर्गिक चक्राने पडलेलं नसतं — ते फेकलं गेलेलं असतं.

माणसाच्या आयुष्यात, समाजाच्या रचनेत, अगदी आपल्या नात्यांतसुद्धा अशी चिपाडं तयार होत असतात. उपयोग होईपर्यंत गोडगोड बोलणं, जवळ घेणं — आणि ज्या क्षणी उपयोग संपतो, तेव्हा बाजूला सारून टाकणं. हाच आहे चिपाड होण्याचा दुःखद, बोचरा अर्थ.

घराबाहेर पडल्यावर अशा कितीतरी कहाण्या कानावर पडतात. वर्षानुवर्षं संसार हाकलेली एखादी स्त्री — कधी सासरच्या घरात, कधी स्वतःच्या मुलांत, वापरली जाते. तिचं प्रेम, तिची सहनशक्ती, तिची निरपेक्षता — सगळं उपसून घेतलं जातं. आणि नंतर एखाद्या वळणावर तिचं अस्तित्वच विसरलं जातं. जणू काही उपयुक्तता संपली म्हणून तिला कोपऱ्यात ढकललं जातं. त्या क्षणी ती स्त्री मनाने, आत्म्याने चिपाड झालेली असते.

किंवा एखादा कर्मचारी — तीस चाळीस वर्षं एका कंपनीत प्रामाणिकपणे काम केलेला. ज्याच्यावर विभाग चालत होता, जो विश्वासाचं प्रतीक होता — त्याच्यावर एके दिवशी बदलाची गदा येते. ‘नवीन माणूस हवा आहे’, ‘सिस्टम नवी करतोय’, ‘आता वेळ झालीय’ — या वाक्यांच्या आडून त्याला एक दिवस बाहेरचं दार दाखवलं जातं. आणि तो मनात एकच प्रश्न घेऊन उरतो — मी इतकी वर्षं इथे कोण होतो? केवळ एक उपयोगी माणूस? की जिवंत माणूस?

अगदी नात्यांतसुद्धा ही गोष्ट दिसते. प्रेमाच्या सुरुवातीला एखादा माणूस दुसऱ्याला हवाहवासा वाटतो. त्याच्या शब्दांचा, त्याच्या सहवासाचा गोडवा घेतला जातो. पण हळूहळू जेव्हा त्या व्यक्तीकडून नवं काही मिळणार नाही, असं वाटतं, तेव्हा त्याचं अस्तित्वच बोथट केलं जातं. मनातून, आठवणीतून, संवादातून. त्या माणसाच्या आत एक गुपित वेदना तयार होते — ‘मी फक्त उपयोगासाठी होतो का? ‘

चिपाड होण्यामागे हीच खरी वेदना आहे — वापरल्याचं भान. मी माझं सर्वस्व दिलं आणि शेवटी फक्त रिकामं शरीर, रिकामं मन उरलं — हा भाव किती खोलवर जखम करतो, हे केवळ त्या अवस्थेत गेलेल्या माणसालाच कळतं.

आता प्रश्न उरतो — आपण चिपाड का होतो? आणि हे टाळता येत नाही का?

हो — टाळता येतं. पण त्यासाठी एक अंतर्बाह्य जागरूकता लागते. आपलं मूल्यमापन दुसऱ्यांच्या वापरावर आधारित ठेवायचं नाही. स्वतःच्या गरजांना, भावनांना, स्वत्वाला अधोरेखित करायचं. ‘मी कोण आहे’ हे रोज नव्यानं आठवत राहायचं. आणि सर्वात महत्त्वाचं — आपल्या रसाचा झरा केवळ इतरांसाठी वाहू न देता, स्वतःसाठी राखून ठेवायचा.

कारण जेव्हा आपल्याकडे स्वतःसाठी काही उरतं, तेव्हा आपल्याला कोणीच चिपाड करू शकत नाही.

म्हणूनच — स्वतःला चिपाड होऊ देऊ नका. आणि कोणालाही चिपाड करून फेकूही नका. हेच एक मोठं माणूसपण असेल.

पण ज्या वेळेस असं वाटतं की आपण आधीच चिपाड झालोय — वापरून, झिजून, टाकून दिल्यासारखं वाटतं — त्या वेळी एक गोष्ट लक्षात ठेवावी लागते : राखेतूनही नवे अंकुर फुटतात.

चिपाड झालेल्या अवस्थेला आपण अंतिम सत्य मानून बसलो, तर तोच आपला शेवट ठरतो. पण जर त्या अवस्थेकडे पाहताना आपण स्वतःला विचारलं — “माझ्यात अजून काय उरलं आहे? ” — तर नकळत आपण एक नवीन उगम शोधू लागतो.

कधी तो उगम एका छोट्या छंदातून उगमतो,

कधी निसर्गाच्या कुशीत नव्याने रुजतो,

कधी अपूर्व अशा पुस्तकाच्या पानातून जागा मिळतो,

कधी अंतर्मनाच्या खोल ध्यानातून आपल्याला नव्याने गंध सापडतो.

कारण कोणत्याही चिपाडाच्या आत एक बियाणं दडलेलं असतं. फक्त त्याला थोडासा स्नेह, थोडीशी ऊब, थोडासा आत्मविश्वास देणं आवश्यक असतं.

आपणच आपल्याला ही ऊब देऊ शकतो.

कोणीतरी बाहेरचं देईल, ह्या आशेवर जगणं म्हणजे पुन्हा वापरून घेण्याचा खेळ सुरु करणं.

आपण ठरवलं, की “माझं अस्तित्व केवळ इतरांच्या उपयोगासाठी नाही — मी माझ्या आनंदासाठी, माझ्या उत्कर्षासाठी आहे” — तर त्या क्षणापासून चिपाड होण्याचा खेळ संपतो. आणि त्या जागेवर एक नवा रस तयार होतो — फक्त स्वतःसाठी वाहणारा.

हा प्रवास फार हळू आहे, फार अंतर्मुख आहे — पण एकदा का सुरू झाला, की तो आयुष्याला एक नवा वास देतो.

म्हणूनच —

तुम्हाला जर आज चिपाड झाल्यासारखं वाटत असेल, तर थांबा.

थोडा श्वास घ्या.

मनाच्या गाभ्यात पहा — अजून काही उरलंच आहे.

तिथूनच एक नवा अंकुर फुटेल — जो या वेळेस स्वतःच्या मातीवर उगम घेईल.

त्याला कोणी वापरू शकणार नाही.

कारण या वेळेस तो स्वतःसाठी उमललेला असेल.

 

लेखिका : सौ. संगीता चव्हाण

प्रस्तुती: सौ. उज्ज्वला केळकर

संपर्क – निलगिरी, सी-५ , बिल्डिंग नं २९, ०-३  सेक्टर – ५, सी. बी. डी. –  नवी मुंबई , पिन – ४००६१४ महाराष्ट्र

मो.  836 925 2454, email-id – kelkar1234@gmail.com 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ “खूप छान वाटतंय” – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – श्रीमती राधा पै ☆

? वाचताना वेचलेले ?

☆ “खूप छान वाटतंय” – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – श्रीमती राधा पै ☆

*

बालपणी ज्यांना चिऊ काऊ चे घास भरवले,

आज ते मला, आई, खाऊन बघ. छान आहे, म्हणून

आपल्या घासातला घास भरवतात..

खूप छान वाटतंय..

 

इवल्याशा पाठीवरचं दप्तर मी उचलून घेई,

आज माझ्या हातातले ओझे उचलायला धावत येतात..

खूप छान वाटतंय..

 

ज्यांची बोटं धरुन अक्षरांशी ओळख करून दिली,

आज ते माझी नवीन टेक्नोलॉजीशी ओळख करुन देतात..

किती मजा वाटते आहे..

 

ज्यांना हात धरुन रस्ता ओलांडला,

आज ते माझा हात धरुन रस्ता ओलांडतात,

हातांची अदलाबदल कधी झाली कळलंच नाही..

पण खूप छान वाटतंय..

 

चालताना उड्या मारु नकोस रे, पडशील, असं म्हणणारी मी..

आणि आज, आई, हळू. पुढे खड्डा आहे म्हणणारे ते,

एवढा प्रवास कधी झाला कळलंच नाही..

पण खूप छान वाटतंय..

 

रिक्षाने जाताना त्यांना आतल्या बाजूला बसवणारी मी..

आज जागा केव्हा बदलल्या, समजलंच नाही..

पण खूप छान वाटतंय

 

प्रयत्न करून बघ, शिकवलंय ना मी तुला, असे म्हणणारी मी आणि आज… सोपंय ग, एकदा शिकलीस की येईल तुला, असे सांगणारे ते….

किती गंमत वाटते आहे..

 

ज्यांचाबरोबर बडबड गीते आणि छान छान गोष्टी ऐकल्या, आज ते आई, हे गाणं ऐकलंस का, बीट्स आवडतील बघ तुला, असं म्हणतात तेव्हा काय सांगू काय वाटतं….

लय भारी वाटतंय..

 

शाळेच्या पिकनिकला जाताना, बस मध्ये बसवून देणारी मी आणि आज मी प्रवासाला जाताना मला बसमध्ये बसवणारे ते..

शब्द तेच, काळजी तीच, भूमिका बदलल्या

किती मस्त वाटतंय. |

 

त्यांना काही होत असेल तर, घाबरणारी मी आणि मला जरा बरं नसलं तर, कासावीस होणारे ते..

किती कृतकृत्य वाटतंय..

 

लहानपणी त्यांचा अनाठायी हट्ट कसा चुकीचा आहे, हे सांगणारी मी, आज माझे एखादे मत कसे चुकीचे आहे, हे माझे मन न दुखावता मला पटवण्याचा प्रयत्न करतात..

किती अभिमान वाटतो..

 

मुले घरात दिसली नाहीत तर, कासावीस होणारे बाबा आणि आज, हे काय, बाबा अजून आले नाहीत म्हणणारी मुलं..

परत शब्द तेच, काळजी तीच, भूमिका कधी बदलल्या समजलंच नाही..

इवलेसे गळ्यात पडणारे हात, आज आधार द्यायला खंबीर झाले..

खूप छान वाटतंय..

नकळत संस्कार घडले,

नकळत भूमिका बदलल्या,

नकळत त्यांच्यात एक संवेदनशील पती आणि हळूवार पिता आकार घेऊ लागला..

खूप धन्य वाटतंय..

*

लेखक: अज्ञात

प्रस्तुती:सौ. राधा पै

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ एका काऊंसेलरची डायरी… लेखिका : श्रीमती सुचित्रा पोकळे ☆ प्रस्तुती : श्रीमती रेखा जांबवडेकर ☆

📖 वाचताना वेचलेले 📖

☆ एका काऊंसेलरची डायरी… लेखिका : श्रीमती सुचित्रा पोकळे ☆ प्रस्तुती : श्रीमती रेखा जांबवडेकर 

सासू आणि सून… अतिशय नाजूक पण अनोखं नातं.

एक स्त्री लग्न करून एका नवीन घरात पदार्पण करते. घराच्या कानाकोपऱ्यात, भिंतींवर, वस्तूंवर तिचा हात फिरतो आणि परकं म्हणता म्हणता ते हळूहळू तिचं स्वतःचं कधी होऊन जातं, हे तिलाही कळत नाही. त्या घरातली माणसं तिची होतात. त्या घराचे नोकरचाकर तिचे होतात. त्या घरातलं अंगण तिचं होतं, अंगणातली झाडं तिची होतात. झाडांची पानं फुलंही तिची होतात.

या सगळ्यावर ती खूप प्रेम करत असते आणि म्हणून ती ते आपलं स्वतःचं मानत असते.

मग हळूहळू ‘माझं’ चे रूपांतर ‘स्वामित्वा’मध्ये होऊ लागतं. कधीकधी ही स्वामित्वाची भावना इतकी प्रबळ होते की आपल्या राज्यात दुसर्‍यांचं आगमन हा उगाचच ‘शिरकाव’ वाटू लागतो.

आत्तापर्यंत तुम्हाला समजलं असेल ही ‘दुसरी’ व्यक्ती कोण? हो बरोबर ओळखलंत… सून.

काही दिवसांपूर्वी माझ्याकडे एक सासूबाई आल्या. म्हणाल्या, “मला मदत करा, मी खूप गुंतत चालले आहे. या विचारातून कशी बाहेर पडू कळत नाहीये. “

मी म्हटलं, “मला नीट सांगाल का? “

त्या म्हणाल्या, “दोन महिन्यापूर्वी माझ्या मुलाचं लग्न झालं. नवीन सून घरात आली आणि लगेच लॉकडाउन सुरू झालं. नवीन जोडप्याला कुठे फिरायलाही जायला मिळालं नाही. त्यांना दोघांना एकमेकांना वेळही देता आला नाही. मला खरंच त्याचे वाईट वाटतेय; पण का कुणास ठाऊक, पण मला बरेही वाटतेय की आपला मुलगा आपल्या सोबतच राहिला. सूनही बरोबर राहील. ते एकमेकांना वेळ देतील; पण मलाही त्यांच्यासोबत वेळ घालवता येईल. सुरुवातीला ठीक वाटलं; पण नंतर नंतर आत कुठेतरी तुटल्यासारखं वाटायला लागलं, अहो… काहीतरी सुटल्यासारखं वाटतेय. आपलं राज्य गेलं, आपला डाव संपला असं काहीसं वाटायला लागलं आहे. सूनबाई छान आहे. घराला अगदी आपलंसं केलं तिने थोड्याच दिवसात. पण मला तेच खटकतंय अहो… का असं?

तिची विचार करण्याची पद्धत वेगळी, तिचं राहणीमान वेगळं, तिचं जेवण बनवण्याची पद्धत वेगळी, घर लावणं, सजवणं याची पद्धत वेगळी. ती सगळं करते; पण तिच्या पद्घतीने. मला हे पचवणं थोडं कठीण जातंय. माझं लेकरू आता माझं राहिलं नाही, माझं घर आता माझं राहिलं नाही, असे काहीसे विचार आताशा मनात यायला लागले आहेत. डोकं भणभणतं अहो माझं. मला सांगा माझं कुठे चुकतंय… “

मी म्हटलं, “पहिले तुम्ही शांत व्हा बरं. इतकं काही झालेलं नाहीये आणि तुमचं इतकंही काही चुकलेलं नाहीये.

मला एक सांगा तुमच्याकडे बाग आहे? त्या बागेत झाडं तुम्ही स्वतः लावली. बरोबर? तुम्ही ती रोपटी कुठूनतरी आणून तुमच्या अंगणात लावली असतील ना? “

त्या अगदी उत्साहाने म्हणाल्या, “हो तर… एक एक रोपटं मी स्वतः आणून आमच्या बागेत लावलं आहे. “

मी म्हटलं, “तुम्ही झाडांना पाणी घालता, खत घालता म्हणजे नक्की कुठे घालता? झाडाला की मातीला? “

त्या म्हणाल्या, “मातीला. “

मी विचारलं, “का? मातीला का घालता? थेट त्या रोपट्यांना का नाही घालत? “

त्या म्हणाल्या, “अहो, मातीला पाणी घातलं, तर त्या रोपट्यांच्या मुळांना ती पकडून ठेवेल आणि मग ते रोपटं छान रुजेल ना. मातीत खत घातलं तर ते अन्न मुळातून झाडाला पोहोचेल ना. “

मी म्हटलं, “अगदी बरोबर आहे;पण म्हणजे त्या दुसरीकडून उपटून आणलेल्या छोटयाशा रोपट्याला आपल्यात सामावून घेण्याची जबाबदारी मातीची आहे आणि म्हणून त्या मातीला आपण खतपाणी घालून तेवढं सक्षम करतो. बरोबर? “

त्या क्षणभर गप्प होत्या. कदाचित त्यांना त्यातला मथितार्थ कळत होता.

मी पुढे म्हणाले, “आपल्या घरात येणारी दुसर्‍या घरची मुलगी ते रोपटं आहे आणि आपण माती. आपली जबाबदारी पहिली. तिची जबाबदारी असतेच, यात शंकाच नाही आणि आपल्या संस्कृतीत ती निभावण्याचे धडे तिच्याकडून लहानपणापासूनच गिरवून घेतलेले असतात. पण मग तरीही हे रोपटं रुजायला वेळ का लागतो? कारण माती कधीकधी आपला धर्म सोडून वागते. मातीचा धर्म आहे रोपट्यांचे पोषण करून त्यांच्या मुळांना आपल्यात सामावून घेणे, स्वतःला घट्ट करून, त्या छोटया छोटया नाजूक मुळांना घट्ट पकडून त्यांना वाढण्यास, रोपट्याचे वृक्षात रूपांतर होण्यास मदत करणे.

माती कधीही असा विचार नाही करत की ही माझी हद्द आहे, इथे दुसरं कुणी आलेलं मला चालणार नाही. “

त्या हसल्या आणि म्हणाल्या, “समजतंय मला. “

मी त्यांना हसून म्हणाले, “अहो, आपण फक्त कर्म करायचं, धर्म निभवायचा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे हे कायम लक्षात असू द्यायचं की आपण सून आपल्या मुलाचा संसार फुलवण्यासाठी आणत आहोत, तर ती तेच करणार आणि आपण तिला ते फुलवण्यासाठी मदत करायची आहे कारण आता आपली भूमिका बदलली आहे, आता आपला धर्म मातीचा आहे. ”

 मला त्यांना एवढंच सांगून चालणार नव्हतं. हे समजवलेलं शेवटपर्यंत टिकावं म्हणून मला त्यांच्यावर थोडे औषधोपचार करणं जरुरी होतं.

आपलं मूल, आपलं घर आपलं राहिलं नाही, ही काहीतरी तुटल्याची, काहीतरी मागे सुटल्याची भावना, त्यातून येणारा एकटेपणा, एकटेपणातून आलेले नैराश्य, विचारांचा गुंता, भविष्याची चिंता, आपण असे का वागतो, असे वाटून येणारा अपराधीपणा आणि या सगळ्यामुळे जडलेला निद्रानाश या सगळ्यावर त्यांना औषधं दिली.

त्या जाता जाता मला म्हणाल्या, “तुम्ही या मातीला नुसतं खतपाणीच घातले नाही, तर तिला तिचा धर्मसुद्धा शिकवलात. “

मी त्यांना म्हणाले, “याचे श्रेय कदाचित माझ्या आईला जाईल, कारण लहानपणापासून मी तिला माती होऊन दुसर्‍यांना सामावून घेताना पाहिले आहे. “

लेखिका: श्रीमती सुचित्रा पोकळे

प्रस्तुती: श्रीमती रेखा जांबवडेकर

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ ‘वय हे मनाला असतं…’ – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुति – श्री मनोहर जांबोटकर ☆

? वाचताना वेचलेले ?

☆ ‘वय हे मनाला असतं…’ – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुति – श्री मनोहर जांबोटकर

वय हे मनाला असतं. शरीराला वय असतं, असं मला वाटत नाही.

मी आपल्याला एक उदाहरण सांगतो.

पंडित सातवळेकर होते – ज्यांनी वेदांचं भाषांतर केलं.

त्यांना जेव्हा शंभरावं वर्ष लागलं तेव्हा मला असंच मनात आल की ह्यांनी फार मोठं कार्य केलेलं आहे, तर आपण त्यांच्या पायावर डोकं ठेवून नमस्कार करुन यावं. म्हणून मी पारडीला गेलो.

शंभरावं वर्ष लागलेल्या माणसाला भेटायला जायचं आहे म्हणून मनाची तयारी करुन गेलो. आजारी असतील, आपण दोन मिनिटांत नमस्कार करावा, ‘बरं वाटतंय ना, काळजी घ्या’ वगैरे सांगावं आणि परतावं अशा विचाराने गेलो होतो. पण मी ज्यावेळेला गेलो त्या वेळेला बघतो, तर ते तिथे त्यांच्या छापखान्यामध्ये वेदांच्या शेवटल्या खंडाच्या पुस्तकाची प्रुफं तपासत बसले होते.

तुमच्यापैकी जे कोणी लेखक असतील त्यांना प्रुफं तपासणं म्हणजे काय आणि तीसुध्दा संस्कृतची म्हणजे काय ते कळेल. ते काळजीपूर्वक तपासत बसले होते.

मी नमस्कार वगैरे केला. मला म्हणाले, “मी वाचलं आहे तुमचं साहित्य”.

मी घाबरलोच एकदम. “असलं काही लिहिण्यापेक्षा बरं लिहा” असा शाप देतात की काय असं मला वाटलं. पं. सातवळेकर हे माझं साहित्य वाचत असतील, असं मला कधीही वाटलं नव्हतं. ते वाचत असल्यामुळे त्यांना विनोदबुध्दी आहे – म्हणजे तारुण्य आहे हेही माझ्या ध्यानात आलं.

ते म्हणाले “आता काय आहे, ही प्रुफं करेक्ट करत आहे. हे काम एकदा झालं (हे शंभराव्या वर्षी) की वेदातले सुंदर वेचे आपल्या तरुण पोरांना माहीत नाहीत, ते मी निवडून काढणार आहे आणि या निवडक वेच्यांचा एक ग्रंथ तयार करणार आहे. त्यात पुढली आठ-दहा वर्ष जातील”.

शंभराव्या वर्षी पुढल्या आठ-दहा वर्षांचा कार्यक्रम त्यांच्या हातात होता. पुष्कळ वेळेला आपण म्हातारे अशासाठी होतो, की तुम्ही जगताय कशासाठी या एका प्रश्नाचं उत्तर आपल्याला देता येत नाही. फक्त आर्थिक उत्पादनासाठी, महिना पगारासाठी हे उत्तर काही आपलं आपल्यालाच समाधान देत नाही. कशासाठी जगतो त्याला एक उदात्त अशा प्रकारचं काहीतरी प्रयोजन जीवनाला लागतं…

(पं. सी. आर. व्यास यांच्या षष्ठ्यब्दपूर्तीसमारंभात पुलंनी केलेल्या भाषणातून)

दादा धर्माधिकारी म्हणतात, तारुण्याचे तीन ‘त’ कार आहेत. तेजस्विता, तपस्विता आणि तत्परता. जर या तीन गोष्टी आपल्यात असतील तर वय ही फक्त एक संख्या उरते. पं. सातवळेकरांच्या बाबतीत हेच असावं. म्हणून १०० व्या वर्षी पुढील आठ वर्षांचे नियोजन त्यांच्याकडे होते.

अशा या अलौकिक व्यक्तिमत्त्वांसाठी सहस्र नमन.

लेखक: अज्ञात

प्रस्तुती :श्री मनोहर जांबोटकर

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ ‘पेन्शन…’ – लेखक: श्री. अमोल अ. पवार ☆ प्रस्तुती – श्री ब्रह्मानंद पै ☆

📖 वाचताना वेचलेले 📖

☆ ‘पेन्शन…’ – लेखक: श्री. अमोल अ. पवार ☆ प्रस्तुती – श्री ब्रह्मानंद पै 

सकाळीसकाळी, बँकेच्या आवारात एक म्हातारी ओरडत, हुज्जत घालत होती. तिचा आवाज इतका कर्कश होता, की बँकेतले स्टाफही क्षणभर थबकले. ती निराधार योजनेतील तिची पेन्शन मागत होती. पण यादीत तिचे नाव नव्हते. कारण शासकीय टेक्निकल त्रुटीमुळे तिचे नाव वगळण्यात आले होते.

गावातील महाराष्ट्र बँकेच्या शाखेत अमरनाथची नुकतीच बदली झाली होती. टापटीप राहणीमान, नाकासमोर काम आणि समोरच्याच्या डोळ्यात बघून बोलण्याची सवय असलेला हा तरुण, पहिल्याच दिवशी बँकेच्या गडबडीत गोंधळून गेला होता.

तिचं एकच म्हणणं होतं, “तुम्हीच खाताय माझे पैसे. “

अमरनाथने स्टाफकडून विचारपूस केली. उत्तर मिळालं, “तिचं दर महिन्याचं हेच नाटक आहे. कधीही येते, भांडते, ओरडते आणि मग निघून जाते. ”

पण दुसऱ्या दिवशी काहीतरी वेगळेच घडले.

दुसऱ्या दिवशी जेव्हा ती पुन्हा आली, अमरनाथने कॅश काऊंटर घेतले होते.

ती लाईनमध्ये उभी राहिली आणि तिचा नंबर आला तेव्हा पुस्तक दिले आणि ती भांडणाच्या तयारीत उभी राहिली.

अमरनाथने तिला काही न बोलता पाचशे रुपयांच्या नोटा काढून दिल्या.

ती क्षणभर गोंधळली.

मग त्या पैशांकडे पाहून डोळे लुकलुकत म्हणाली, “माझी पेन्शन थटवता व्हय… आज कशी दिली? येत नाय म्हणायचं, अन आता कसली दिली? ”

सगळा स्टाफ अचंबित झाला. पण कुणाला काही कळले नाही.

त्यानंतर दर महिना ती म्हातारी वेळेवर बँकेत येऊ लागली. पेन्शन घेऊन जाऊ लागली.

एक वर्ष, दीड वर्ष सरले. दर महिन्याला ती आली, लाईनीत उभी राहिली, पुस्तक दिले, आणि तिच्या हक्काच्या पेन्शनचे पैसे अमरनाथकडून घेत राहिली.

अमरनाथने एकदाही तिला खरे सांगितले नाही की ते पैसे त्याच्या पगारातून जात आहेत.

त्या दरम्यान त्यांची चांगली ओळख झाली. अमरनाथ तिचं पुस्तक घेताना हसून म्हणायचा, “आज्जी, येतेय की नाही आता शासनाकडून पेन्शन… तुमचा दरारा सगळ्यांच्यावर आहे” आणि ती काहीबाही बडबड करत पैसे घेऊन जायची.

दोघांत चेष्टा मस्करी चालू लागली.

परंतु, एके दिवशी अमरनाथ बँकेत नव्हता.

ती आली, लाईनीत उभी राहिली.

पुस्तक दिले.

पण स्टाफने तिला सरळ सांगितले.

तिचं खातं बंद झाले आहे…!

तिला राग आला आणि ती अजून बडबड करू लागली.

“तो साहेब कुठंय? तो दर महिन्याला देतो मला माझी पेन्शन! “आणि आता आज काय झालं..

स्टाफने सांगितलं,

“अमरनाथ साहेबांचा आज अपघात झालाय. ते गंभीर जखमी झालेत. आणि कराडच्या दवाखान्यात आहेत. “

म्हातारी काही बोलली नाही. गप्प बसली. दुसऱ्या दिवशी ती परत आली. पुन्हा विचारलं.

“पैशे आले नाहीत आणि नेहमीचे अमरनाथसाहेब पण आले नाहीत. ” ती दंगा करू लागली.

मुख्य साहेबांनी तिला केबिनमध्ये बोलावलं. आणि खरे सांगितले.

“आज्जी, तुमची पेन्शन सरकारकडून गेल्या दीड वर्षांपूर्वीच बंद झाली आहे. अमरनाथ साहेब दर महिन्याला तुम्हाला त्यांच्या पगारातून तुमची पेन्शन द्यायचे. आणि आता त्यांचा अपघात झालाय. बेशुद्ध आहेत. ऑपरेशनसाठी तीन चार लाख लागणार आहेत. “

तिचा चेहरा पडला. ती काहीही बोलली नाही. शांत मान खाली घालून उभी राहिली. तिचे डोळे भरून आले आणि ती तिथून निघून गेली.

त्याच रात्री कराडच्या हॉस्पिटलमध्ये अमरनाथचे ऑपरेशन करायचे होते. खर्च – चार लाख येणार होता.

घरात वडील नव्हते.

एक आई, एक लहान बहीण.

दोघीही रडत होत्या.

स्टाफ आणि साहेबांनी साडेतीन लाख त्यांच्या हातात दिले आणि त्यांना मदत केली. ऑपरेशन झाले. काही दिवसांनी अमरनाथ शुद्धीवर आला. हालचाल झाली. बोलू लागला. आईने साहेबांनी मदत केल्याचे सांगितले. त्याला खूप अभिमान वाटला की सर्वांनी मदत केल्यामुळे आपल्याला अमोल जीवदान मिळाले आहे. त्यांचे उपकार विसरता येणार नाहीत.

एक महिना गेला. तो बँकेत येऊ लागला.

काम सुरळीत सुरु झाले.

पेन्शन वाटपाचा दिवस आला.

अमरनाथ काउंटरवर होता. आणि ती म्हातारी पुन्हा आली.

पुस्तक दिलं.

आजारपण, औषधाचा खर्च व कामावरील सुट्टीमुळे अमरनाथकडे तिला द्यायला पैसे नव्हते.

तो म्हणाला, “आज्जी, आज आले नाहीत पैसे… पण इथे दाखवतेय की उद्या नक्की येणार आहेत… ” त्याचं बोलणं अडखळलं. त्याच्या डोळ्यांत अपराधीपणा दिसत होता.

म्हातारी काही बोलली नाही.

ती सरळ आत काऊंटरमध्ये गेली. आणि एका क्षणात अमरनाथला घट्ट मिठी मारली. व जोरजोरात रडू लागली. त्याला काहीच कळले नाही.

सगळा स्टाफ बाहेर आला. आश्चर्याने सगळे बघत होते.

साहेब केबिनमधून बाहेर आले, पुढे येऊन म्हणाले, “आता सांगतो अमरनाथ…

हिला सगळं कळलं आहे. तू तिला तुझ्या पगारातील पैसे देत होतास, हे जेव्हा तिला कळलं तेव्हा अपघातानंतर तुझं ऑपरेशनच्या वेळी एका तासात हिने तिचं घरातील सोनं गहाण ठेवून साडेतीन लाख रुपये माझ्याकडे आणून दिले.

आणि एक अट घातली – हे तुला सांगायचं नाही. आम्ही मान्य केलं. पण आज ती थांबू शकली नाही. तू तिला दर महिन्याला मदत करत होतास. आणि तिला समजल्यावर तिने कसलाही विचार न करता तिच्या आयुष्याची शिदोरी तुला देऊन तुझा जीव वाचवला. “

अमरनाथचे डोळे भरून आले. त्याने त्या म्हातारीला घट्ट मिठी मारली आणि दोघे आज्जी-नातू रडू लागले.

अमरनाथ म्हणाला “आज्जे, का एव्हढं केलंस माझ्यासाठी.. “

आज्जी रडत म्हणाली, ” मी परकी असली तरी तू आज्जीसारखं माझ्यावर प्रेम केलंस… मला दीड वर्ष पेंशन देत हुतास. मग मी माझ्या नातवाला अशी दवाखान्यात तडपडत ठेवेन का रे बाळा….!”

पण सगळा बँकेचा माहोल भावनिक झाला.

सगळेजण रडत होते.

कधी कधी आपलं दिलेलं प्रेम आणि केलेली मदत नकळत आपल्या आयुष्यात मोठं काही परत घेऊन येतं. कर्माच्या हिशेबात एकही रुपया कमी-जास्त राहत नाही. जीवन अमोल आहे.

दिलेलं आपल्याकडे परत येतंच – त्यामुळे कर्मावर विश्वास ठेवून कर्म चांगले करत रहा.

लेखक: श्री. अमोल आ. पवार

प्रस्तुती: श्री. ब्रह्मानंद पै

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ मुलं आणि काम… – लेखिका: सौ. अमृता खंडेराव ☆ प्रस्तुती – सौ. प्रज्ञा गाडेकर ☆

? वाचताना वेचलेले ?

⭐ वजनकाटा ठेवला झाकून – कवी : अज्ञात ☆ प्रस्तुती – सौ. प्रज्ञा गाडेकर ⭐

परवा आमच्या घरी एक सुशिक्षित महिला तिच्या तरुण मुलीला घेऊन आली होती. त्यांच्या ओळखीच्या एका महिलेला महिला मदत केंद्रात काही काम मिळेल का, याची चौकशी करण्यासाठी त्या आल्या होत्या. त्या दुरून आल्यामुळे मी त्यांच्यासाठी पोहे भिजवले.

दोघी मायलेकी स्वयंपाकघरात येऊन बसल्या. त्या मुलीला म्हणाल्या, “काकूंना मदत कर.” मी मोठ्या कौतुकाने त्यांच्या मुलीसमोर कोथिंबीर ठेवली आणि तिला निवडायला सांगितली.  कांदा चिरताना सहज त्या मुलीकडे पाहिलं, तर ती दोन्ही हातात कोथिंबिरीची काडी धरून खाली-वर पाहत होती. मी तिच्याकडे पाहत आहे हे लक्षात आल्यानंतर तिने विचारले,

“काकू, ट्विग्ज ठेवायच्या की फक्त पानं ठेवायची?”

“तू घरी जशी निवडतेस, तशीच निवड.”

मी म्हणाले. मग त्या मुलीने तिच्या आईकडे पाहिलं.

दोघीही मायलेकी ‘दृष्टादृष्ट विजये होआवेजी…’ अशा अद्भुत पद्धतीने एकमेकींकडे बघू लागल्या. मग मी पुढे होऊन डाव्या हातात एक काडी घेतली आणि  कोवळ्या देठांसह पाने तोडून तिला कोथिंबीर कशी निवडायची, ते दाखवले. मी दोन-तीन दांड्या तोडून दाखविल्यानंतर तिने लक्षपूर्वक पाहिले आणि म्हणाली,

“ओह… ओक्के…”

मग ती अत्यंत सावकाश आणि काळजीपूर्वक कोथिंबीर निवडू लागली.

“अहो मॅडम, आम्ही तिला घरातले कोणतेच काम करू देत नाही. तू फक्त तुझा अभ्यास कर, असे आम्ही तिला सांगितले आहे…”

तिची आई अभिमानाने मला म्हणाली.

मुलीला घरातले काम करू न देण्यात कसला अभिमान आहे, ते मला समजत नाही.

पंधरा वर्षाच्या त्या मुलीला साधी कोथिंबीर निवडता येत नाही, याचे मला खरोखर आश्चर्य वाटले. माझा मुलगा पाचवीत असल्यापासून व्यवस्थित कोथिंबीर निवडतो. तो काही रोज कोथिंबीर निवडत नाही, पण त्याला कशी निवडायची ते पाहून पाहून माहीत आहे.

विशिष्ट क्षेत्रात अत्यंत उच्च दर्जाचे करिअर किंवा कौशल्य असणाऱ्या व्यक्तींकडून कोथिंबीर निवडण्याची अपेक्षा ठेवू नये; परंतु सामान्य कुटुंबातल्या सामान्य मुला-मुलींना हे कौशल्य यायला काही हरकत नसावी, असे वाटते.

काही जीवनावश्यक कौशल्ये योग्य वेळी मुला-मुलींना शिकवली पाहिजेत. इथे लिंगभेद न करता सगळी कामे दोघांना आली पाहिजेत, हे लक्षात ठेवले पाहिजे. ज्यांना भाकरी करता येत नाही अशा अनेक महिला मला माहीत आहेत. भाकरी करता येणे, हे जगातले सर्वोच्च कौशल्य नव्हे. पण स्वतःला खाण्यापुरता स्वयंपाक करता येणे निश्चितच गरजेचे आहे.

आमच्या ओळखीतल्या एका उच्चभ्रू आणि सुशिक्षित कुटुंबात त्यांच्या मुलासाठी मुलगी पाहणे सुरू आहे. त्यांचा मुलगा पुण्यात शिकला आणि चांगल्या पगाराच्या नोकरीवर आहे. बाहेर एकटा राहिल्यामुळे त्याला स्वयंपाक आणि घरातली कामे चांगली करता येतात, असे त्याच्या आईने सांगितले. त्यांनी मोठ्या शहरातल्या काही कमावत्या मुली पाहिल्या. पण त्या मुलींनी ‘घरातली कामे करण्यात आम्हाला अजिबात इंटरेस्ट नाही,’ असे स्पष्ट सांगितले. त्यामुळे त्याची आई आता खेड्यावरच्या कमी शिकलेल्या मुली शोधत आहे.

मुलगा असो किंवा मुलगी, आयुष्यात घरातली सगळी कामे कधी ना कधी करावीच लागतात. स्वतःसाठी किंवा कुटुंबासाठी स्वयंपाक करण्यात किंवा इतर कामे करण्यात काही कमीपणा आहे असे मुलींना का वाटत असावे?

मूलभूत गरजा पूर्ण करण्यासाठी करावी लागणारी दैनंदिन कामे कितीही क्षुल्लक वाटली तरी ती महत्त्वाचीच असतात. शिक्षण, आर्थिक स्वावलंबन आणि स्वातंत्र्य मिळाले, म्हणून या कामांचे महत्त्व कमी होत नाही.

टापटीप, नीटनेटकेपणा, घरगुती स्वच्छता याचा शिक्षणाशी काहीही संबंध नाही. सुशिक्षित आणि अशिक्षित दोघांनाही याची सारखीच गरज आहे. कमावत्या मुलींनी घरातली कामे करण्यात काही कमीपणा आहे, अशी विचित्र विचारधारा पाहिली की आश्चर्य वाटते.

महात्मा गांधींनी ‘नई तालीम’ ही शिक्षण पद्धती सुरू केली होती. इथे विद्यार्थ्यांना अन्न पिकविण्यापासून ते स्वयंपाक करण्यापर्यंत  सर्व प्रकारचे जीवनावश्यक शिक्षण द्यावे, असे त्यांचे मत होते. कुठलेही काम कमी दर्जाचे नाही आणि कुठल्याही कामाची लाज वाटते कामा नये, असा त्यापाठचा विचार होता.

पूर्वी जिल्हा परिषद शाळांना ‘जीवन शिक्षण विद्या मंदिर’ असे नाव दिले जायचे.

जीवन जगण्यासाठी आवश्यक असलेली मूलभूत कौशल्ये सर्वांनी शिकली पाहिजेत, अशी यामागची विचारधारा होती. आपण कितीही उच्च-अत्युच्च शिक्षण घेतले तरी भूक लागल्यावर पटकन दोन पोळ्या करून खाता यायला पाहिजेत. डाळ, भात, खिचडी करता आली पाहिजे.

“आम्ही आमच्या मुलींना अजिबात काम सांगत नाही.” असे आजकाल अनेक आया बोलताना आढळतात. पण “आम्ही आमच्या मुलींना अजिबात मोबाईल वापरू देत नाही,”  असे बोलणारी मात्र एकही आई सापडत नाही. दिवसाचे 24 तास कुणीच अभ्यास करत नसते. यांच्या मुली अखंड मोबाईलमध्ये मुंडी खुपसून बसलेल्या यांना चालतात. घरातली कामे करताना मात्र चालत नाहीत‌.

मुला-मुलींच्या हातात आयते ताट द्यायचे, इथपर्यंत ठीक आहे; पण जेवल्यानंतर ताट सिंकमध्ये नेऊन टाकावे, एवढे पण यांना जमत नसेल तर ही काही यांच्या उज्वल भविष्याची नांदी नाही.

सगळ्यात शेवटचा आणि गंभीर प्रश्न- या सगळ्या मुली श्रीमंत घरात गेल्या, तर नोकर चाकर ठेवू शकतात किंवा कामासाठी अत्याधुनिक मशीन्स वापरू शकतात. पण या स्वतःच कमी कमावत असतील किंवा मध्यमवर्गीय कुटुंबात राहायची वेळ आली, तर या काय करणार? त्यातही त्या अजिबात कमावत नसतील आणि गरिबीत राहायची वेळ आली तर ‘आम्हाला कामाची सवय नाही,’ असे म्हणून यांचा निभाव लागेल का?

भविष्यात कधीतरी स्वतःचा संसार सुरू केल्यानंतर जर यांना घरातली कामे करायची अशीच लाज वाटत राहिली तर त्यांचं कुटुंब चालणार कसे? आपल्या मुलांनी कामच करायचे नाही, असल्या कुठल्यातरी भ्रामक कल्पनांच्या आहारी जाऊन आपण नवीन पिढीचे नुकसान तर करत नाही ना, याचा प्रत्येक पालकाने शांतपणे विचार केला पाहिजे.

लेखिका: श्रीमती अमृता खंडेराव.

प्रस्तुती: श्रीमती प्रज्ञा गाडेकर

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ “परतवारी…” – लेखिका:सौ.नीलिमा लेले ☆ प्रस्तुती – सौ. मंजुषा सुनीत मुळे ☆

सौ. मंजुषा सुनीत मुळे

📚 वाचताना वेचलेले 📖

☆ “परतवारी…” – लेखिका:सौ.नीलिमा लेले ☆ प्रस्तुती – सौ. मंजुषा सुनीत मुळे ☆

सुमेधाबाई घराला कुलूप लावून बाहेर पडल्या.रोजच काही बाहेरची कामे करुन थोडंसं चालून परत घरी जायचं, हा शिरस्ता होता त्यांचा .

त्यांच्या मनात आलंच, आज लायब्ररीत गेल्यावर ग्रंथपाल म्हणणारच आहेत ,अहो किती उशीर ?वेळेवर पुस्तके परत करा .

त्या म्हणाल्या , सॉरी हं! पाहुणे होते त्यामुळे जमलं नाही .

त्यांच्या मनात आलं, माझा ७० वा वाढदिवस म्हणून सगळे जमा झाले होते हे कुठे त्यांना सांगा .

 त्या म्हणाल्या, “अहो हे पुस्तक वाचायचं राहिलं.’परतवारी’. न वाचता परत करवेना .

अहो ,पंढरपूरच्या वाटेवरील  ज्ञानोबा माऊलींच्या  वारीवर सारेच भरभरुन लिहितात पण पंढरपूरहून आळंदीला परत जाताना त्या पालखीबरोबर  परतीची पण १० दिवसाची परतवारी असते हे माहीतच नव्हतं हो कधी .”

ग्रंथपाल म्हणाले, “हो बऱ्याच जणांचा अभिप्राय आहे, छान आहे पुस्तक असा. ठीक आहे होतो उशीर एखादेवेळेस. चालायचंच.”

 

त्या दुसरी पुस्तके घेऊन बाहेर पडल्या .

आता थोड्या वेळ  चालावं म्हणून त्या समोरच्या पार्कात शिरल्या .

चालताना तेच होतं डोक्यात ,या लेखकाला इतकी कष्टाची परतवारी का करावीशी वाटली असेल?

आपल्याला हे माहीतच नव्हतं .

 त्यांच्या मनात आलं, मीही १५ वर्षांपूर्वी एकदा मैत्रिणीबरोबर वारीचा अनुभव घेतलाय की.घरात काय कौतुक सगळ्यांना माझं तेव्हा!अगदी  नवऱ्यासकट

मुलांनीही  वारीच्या वाटेवरील प्रत्येक गावात कुणी ओळखीचं आहे का शोध घेतले. फोन नंबर मिळवले. मला कुठेही कसली अडचण येऊ नये म्हणून . बरोबर  तयारी किती, काळजीने प्रत्येकाच्या सूचना किती!

पण एकदा अनुभव घ्यायचाच होता.

मग एका चांगल्या दिंडीत पैसे भरलेच होते आणि तरीही वाटलं तरी प्रत्येक गावात कुणी ना कुणी ओळखीचे होतेच .

आणि तसाही  गावोगावी पालखीचा काय थाट असतो!प्रत्येक मुक्कामी लाखभर  लोक असतात . वारकऱ्यांसाठी सारा गाव अक्षरश: सेवेला असतो. अगदी चहा, जेवण, औषधांपासून रात्री दमल्यावर पायाला तेल चोळून देण्यापर्यंत सारे सेवा करतात.

आणि हे दरवर्षी असतं.

त्या वारीला  सुधीर महाबळांनी ऐश्वर्य वारी म्हटले आहे आणि परत वारीला वैराग्य वारी .

कारण परतीच्या प्रवासात ४००/५०० च लोक असतात वारीबरोबर .

चालताना आपण एकेकटे असतो .

वाटेवरच्या  गावात त्यावेळेस कसलीही सेवा पुरविली जात नाही .

जिथे पालखी उतरलेली असते तिथे थोडीफार सोय होते .

जो प्रवास जाताना २०/२२ दिवसांचा असतो तो परतताना फक्त १०  दिवसांचा असतो त्यामुळे मुक्कामाचे थांबे पण निम्मे होतात .

रोज ३५ किलोमीटर चालायचं. रात्री  १/२ वाजताच चालायला सुरुवात करायची.

कुठे मिळेल तिथे टेकायचं काय मिळेल ते खायचं .

आता कोणीही नसतं आपल्या स्वागताला .

त्यामुळे इथे स्वार्थ अहंकार  गळूनच पडतात.म्हणून याला त्यांनी वैराग्यवारी म्हटले आहे .

वाचताना सुद्धा मन हरवून गेले त्या वातावरणात .

ते वाचल्यानंतर मनात आलं ,

खरच आपला जीवनप्रवास म्हणजे पण एक वारीच आहे की .जिथे सुरुवातीचा संसाराचा काळ … ,मी त्याला आनंदवारी म्हणेन ….किती सुखसोयी ,किती मानसन्मान, किती कोडकौतुक .

कितीही कष्ट पडले तरी रात्री येणारी  सुखाची झोप आपली होती .

रोज सांजवात लावताना तुळशीजवळ दिवा लावताना हात जोडले की देवाचा वरदहस्त  आहे आपल्या माथ्यावर याची जाणीव व्हायची. 

पण आता गाडी उताराला लागेल तेव्हा ती परतवारीच म्हणावी लागेल .

आरोग्य जे पूर्वी टिकून रहात होतं ते वेगाने आपलं आसन हलवतंय, याची जाणीव होईल  . 

आपल्या आनंद वारीत आपल्या आजूबाजूला अनेक हात आपल्या हातात होते.

त्यांच्यासमवेत रस्त्यावरील प्रवास  कसा आनंदात गात व्यतीत होत होता . 

आता एकेक हात हातातून निसटतोय .

 

परतवारीत माऊलींच्या पादुका आपल्या स्थानी परत नेण्याचे कर्तव्य असते ते भक्तीने निभावलेले असते .

 तसंच आपले सारे करणारे मदतीचे हातही फक्त कर्तव्य म्हणूनच आपली पालखी उचलतील .

 

खाण्यापिण्याचे आता लाडही  होणार नाहीत  कारण आपली वैराग्यवारी सुरु होणार आहे .

त्यात आपसूकच शरीराच्या गरजा कमी होतील. जिभेचे चोचले कमी करावे लागतील .

 

त्या  परतवारीत जसं जीवनाचं प्रखर वास्तव नजरेत आलं लेखकाच्या,तसं आता आपल्यालाही हळूहळू ही प्रखर जाणीव होत राहील .

 

पण म्हणून कुणी वारी, परतवारी थांबवत नाही .

आयुष्यातील सारे टप्पे पूर्णपणे  जगल्याशिवाय मुक्ती नाही, हे वास्तव आहे .

मग जे जगायचे ते या सुंदर  जीवनावरील प्रेमाने, त्याने दाखवलेल्या आनंदवारीतील अनेक अनुभवातून समजलेल्या त्या शक्तीचे  भक्तीभावाने ऋण मान्य करण्यासाठी तरी आनंदवारीबरोबर परतवारीही तेवढ्याच आनंदाने करायला हवी .

 

वारीमध्ये लाखो लोक असतात, तेव्हा भजन कीर्तन आणि आजूबाजूला कोलाहलअसतो. पण परतवारीत बरोबर कोणीही नसते.

 पालखीच्या आगे मागे  चालत रहायचे.

रात्रीच्या पहाटेच्या नीरव शांततेत  गहिऱ्या निसर्गाचे, पक्षांचे ,पायाखाली वाजणाऱ्या पानांचे ,अंधाराचे ,शांततेचे जे  अनुभव येतात ते माणसाला अंतर्मुख करतात, असे लेखकाने म्हटले आहे .

 

आपल्या आयुष्यातील परतवारीमध्ये पण आपण एकटेपणाच्या संगतीत  पहाटेच्या नीरव शांततेत एकट्यानेच मार्गी चालताना

असे अंतर्मुख करणारे क्षण आपणही  अनुभवणार आहोतच .

 

वारीबरोबरच परतवारीही  असते आणि इतक्या कष्टातही ती करणारेही असतात, हे कळल्यापासून तर खरंच ही वारी आणि परतवारी  म्हणजे सुद्धा जगण्याचं शिक्षण देणारे ,वारीचा आनंद घेतल्यावर परतीच्या प्रवासात मनाला समजावून हसत हसत वास्तव स्वीकारायला लावणारे ,

आपल्या मनाला शिस्त लावणारे ,

तरी परत परत ओढ लावणारे

विद्यापीठच आहे हे मान्यच झाले मला,

असं म्हणत त्यांनी समोर पाहिले .

कधी घर आलं कळालंच नाही, असं म्हणत सुमेधाबाई पर्समध्ये किल्ली शोधायला लागल्या .

लेखिका:सौ.नीलिमा लेले

प्रस्तुती : सौ. मंजुषा सुनीत मुळे 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈ 

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ “मुलं खरंच बदललीत का?…” – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – सौ. स्मिता सुहास पंडित ☆

सौ. स्मिता सुहास पंडित

? वाचताना वेचलेले ?

☆ “मुलं खरंच बदललीत का???” –  लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – सौ. स्मिता सुहास पंडित 

मुलं खरंच बदललीत का??? ”

“मुलं बदललीत… आजकालच्या पिढीला आई-वडिलांची किंमत राहिली नाही” — असं म्हणणं आपण वारंवार ऐकतो. पण खरंच मुलं बदललीत का? की त्यांच्या आयुष्याची परिस्थिती इतकी बदलली आहे, की त्यांना बदलणं भागच पडलं आहे?

पूर्वीचं जीवन निराळं होतं. घर मोठं होतं, शेती हा मुख्य व्यवसाय होता, सर्वजण एका छताखाली राहत होते. घरातली वयोवृद्ध आई-वडील एक कोपऱ्यात असायचे, तरी त्यांचं अस्तित्व घरातल्या प्रत्येकासाठी जिव्हाळ्याचं असायचं. पण आज?

शहरातल्या छोट्या फ्लॅटमध्ये, तीन खोल्यांतच सगळी कोंडी. ऑफिस, मुलांचं शिक्षण, गृहिणींचं काम, आणि आई-वडिलांची सेवा — सगळं एका साच्यात बसवायचं म्हटलं की खरच शक्य होत का. त्यात च आईवडिलांना गावी राहायची सवय असेल तर त्यांना इकडे करमत ही नाही.

आजचं युग तंत्रज्ञानाचं आहे. सगळं काही झपाट्याने बदलतंय — महागाई, स्पर्धा, अपार खर्च. वयोमानानुसार औषधांची गरज वाढते, पण त्या औषधांचा खर्च आणि दवाखान्यांची फी सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर आहे. सरकारी रुग्णालयात सोयी नाहीत, आणि खासगी दवाखान्यात उपचार अतिशय महाग झाले आहेत. ब्लड टेस्ट, एक्सरे एमआर आय हे सगळ करायचं असेल तर ते सर्व खूप च खर्चिक आहे. कुठून आणणार ही मुलं. त्यातल्या त्यात ज्यांना पेन्शन आहे त्यांचं ठीक आहे. पण पेन्शन नसेल तर….

लोक म्हणतात आईवडिलांनी नाही का चार मूल सांभाळली. खरे आहे ते. पण लहान मुलांना एव्हढा दवाखाना लागत नाही.

या सगळ्यातून एक मुलगा किंवा सून, खऱ्या अर्थानं हतबल होतात. त्यांच्यात भावना आहेत, त्यांनाही वाटतं की आईवडिलांचं योग्य सांभाळ करावा, त्यांना आधार द्यावा. पण वास्तव ही वेगळीच कहाणी सांगतं.

कामाच्या वेळा, आर्थिक अडचणी, जागेची कमी, आणि वाढती जबाबदारी यामुळं त्यांचीही चिडचिड होते. ते अपयशी नाहीत, पण परिस्थितीमुळे थकलेले असतात.

म्हणून, याआधारे विचार केल्यास, मुलं बदलली आहेत असं म्हणण्याऐवजी,

“परिस्थिती बदलली आहे, आणि त्यात सगळ्यांनाच जुळवून घ्यावं लागतंय, ”

असं म्हणणं जास्त योग्य ठरेल.

माणूस वयाने मोठा झाला की त्याला औषधापेक्षा माणसांची साथ हवी असते. घर छोटं असलं तरी मन मोठं असेल, तर आईवडील त्यातही मावत असतात. आणि मुलं अपुरी असतात असं नाही — त्यांना फक्त समजून घ्यायला हवं.

शेवटी एवढंच म्हणावंसं वाटतं:

“नात्यांना दोष देण्यापेक्षा, परिस्थिती समजून घ्या… माणूस मनाने जवळ आला, की जागेचा प्रश्नच उरत नाही!”

 

लेखक : अज्ञात 

प्रस्तुती : सौ. स्मिता सुहास पंडित 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares