☆ “प्रारब्ध…” – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – सौ. शोभा जोशी ☆
केलेली कर्म ही केंव्हा ना केंव्हा भोगल्या शिवाय त्यातून सुटका नाही. म्हणून उगाच असं झालं, तसं झालं,असं करायला हवं होतं. मग असं झालं असतं. वगैरे, वगैरे सगळं विसरा.
– – कारण जे झालं ते तसंच होणार होतं. ते आपलंच पूर्वीचं केलेलं कर्म आहे.
*
कंसाचा वध केल्यानंतर जेव्हा, श्री कृष्णाने, वसुदेव- देवकीची कारागृहातून सुटका केली तेव्हा देवकी त्याला म्हणाली,
“हे कृष्णा!! अरे तू स्वतः साक्षात् परमेश्वराचं रूप आहेस ना? तर मग तू कधीच कंसाचा वध करू शकत होतास…! मग कंसाला मारून आमची त्याच्या कैदेतून सुटका करायला तू चौदा वर्ष॔ का थांबलास?
यावर श्रीकृष्ण म्हणाले.
“माते, गेल्या जन्मात तू मला चौदा वर्षे वनवासात कां बरं पाठवलं होतंस?”
श्रीकृष्णांचं उत्तर ऐकून देवकीला धक्काच बसला.
देवकी म्हणाली मी?….अरे मी कधी तुला चौदा वर्षं वनवासात पाठवलं होतं….?_हे काय बोलतो आहेस तू….?
त्यावर कृष्ण भगवान म्हणाले,_
“माते ही घटना गतजन्मातली असल्यामुळे आता तुला त्यातलं काहीच आठवत नाही. पण गेल्या जन्मात तू कैकयी होतीस…आणि तूच मला चौदा वर्षांसाठी वनवासात पाठवलं होतंस.
हे ऐकून देवकीला धक्काच बसला, आणि तिने आश्चर्याने विचारलं,
“कृष्णा मी गेल्या जन्मातली कैकयी..? तर मग त्या जन्मातली कौसल्या कोण…?”
यावर श्रीकृष्ण हसून वदले,__
माता यशोदा म्हणजे गेल्या जन्मीची कौसल्या होय. जिला गेल्या जन्मात, माझी आई असूनही चौदा वर्षं पुत्रप्रेमाला पारखं व्हावं लागलं होतं. तेच प्रेम तिला माझी माता म्हणून या जन्मी लाभलं…..आणि तुला पुत्र प्रेमाला पारख व्हावं लागलं.
“माते, प्रत्येकाला आपल्या पूर्वजन्मीच्या कर्मांची फळं ही भोगावीच लागतात…..त्यातून देवांचीही सुटका होत नाही….!”
– – विचार करा मग आपण कां वाईट वाटून घ्यावं.? जे आहे ते भोगूनच संपवणे हे योग्य. कारण सुटका नाही….. ‘ गत जन्माची पापे. ती येती भोगरुपे…’
– – आणि भोग हे सोडूनच संपवावे लागतात.
श्रीकृष्ण:शरणं मम् ॥
☆
लेखक : अज्ञात
प्रस्तुती: श्रीमती शोभा जोशी
मो ९४२२३१९९६२
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
एकंदर वर्ग सारवून घेणं हा आमच्यासाठी सोहळाच असायचा.
शाळा सुरू असताना काही पोरं गायब झाल्यावर ती पोरं कुठं गेली असतील ते गुरुजी अचूक ओळखायचे.
शर्ट-विजार ओली असेल तर मासे धरायला ओढ्याला…
करदोरा ओला असेल तर मुलगा नदीवर पोहून आलेला…
हाता-पायांवर ओरखडे असतील तर बोरीच्या झाडावर चढून बोरं खाऊन आलेला…
तोतरं बोलला तर बिबीची फुलं खाऊन आलेला…
हाता-पायांवर मोठाल्या लाल रेषा असतील तर कुणाच्या तरी शेतात शिरून ऊस तोडून खाऊन आलेला…
जीभ लालसर जांभळी असेल तर जांभळं खाऊन आलेला…
बोटात बारीक काटे असतील तर सबरीची बोंडं खाऊन आलेला…
तोंडाभोवती चिकटपणा असेल तर गुऱ्हाळात जाऊन गूळ खाऊन आलेला, हाता-पायांवर पांढुरका चिकटा असेल तर कुणाच्या तरी शेतात जाऊन हरभरा खाऊन आलेला…
अशा निरनिराळ्या खुणांवरून गुरुजी विद्यार्थ्यांची चोरी नेमकी पकडायचे.
गुरुजींनी बरोबर कसं ओळखलं म्हणून त्या वयात आम्हा विद्यार्थ्यांना अतोनात आश्चर्य वाटे.
शाळा अशा मजेत चालायच्या!
आम्हाला खाकी चड्डी आणि पांढरा सदरा असायचा.
अनेकांच्या चड्डीच्या मागच्या बाजूला कमी-जास्त मोठी असलेली आयताकृती ठिगळं असायची.
सदऱ्याचा पुढचा भाग फाटलेला म्हणून ते फाटलेलं झाकण्यासाठी पुढून शर्टिंग आणि मागचं चड्डीचं ठिगळ झाकण्यासाठी सदऱ्याचा मागचा भाग शर्टिंग न करता तसाच राहू दिला जायचा.
☆ “नकळत विसरली जाणारी गोष्ट…” – लेखक: श्री क्षणस्थ नील ☆ प्रस्तुती – श्री मोहन निमोणकर ☆
आज सर्वजण योगेश्वराला भजतात… पण एक गोष्ट नकळत विसरतात!!!
कुणालाही आठवत नाही की त्याच दिवशी जन्माला आलेली एक मुलगी जी कृष्णाऐवजी अदलाबदल केली गेली होती…
कृष्णाचे आयुष्य अनमोल होते.
पण ही मुलगी जणू त्याला जन्माला घालण्यासाठी जन्माला आली होती.
– – ‘ योगमाया ‘
आज केवळ कृष्णाचा वाढदिवस नाही तर योगमायेचाही वाढदिवस आहे. योगमाया कंसाच्या तावडीतून सुटली अन् स्वर्गाकडे उड्डाण केले आणि जाताना कंसाला आकाशवाणी करून सावध केले की ‘ तुझा मारेकरी जन्माला आला आहे.
शास्त्रात स्पष्टपणे नमूद केलेले नाही की ती सुद्धा कृष्णाच्या इतर भावंडांप्रमाणे मारली गेली.
Incarnation!
Twin flames!!
Soulmate!!!
योगमाया देखील आदिशक्तीचा अवतार होती. जी काही जुने वचन पाळण्यासाठी भगवान विष्णूच्या अवतारासह जन्माला आली. जेव्हा कंसाने तिचे पाय पकडले आणि तिला जमिनीवर फेकले तेव्हा ती स्वर्गाच्या दिशेने उडाली आणि म्हणाली,
“कंसा, तुझ्या मारेकऱ्याने आधीच जन्म घेतला आहे. मी तुला ठार मारू शकते पण तू माझ्या पायाला स्पर्श असल्याने मी त्याला तुझ्या विनम्रतेची अभिव्यक्ती मानते आणि तुला क्षमा करते.”
कृष्णाचा जन्म रात्रीच्या अंधारात, कारागृहाच्या बंदिस्त जागेत झाला. तथापि, त्याच्या जन्माच्या क्षणी, सर्व रक्षक झोपले, साखळया तुटल्या आणि बंद केलेले दरवाजे हळूवारपणे उघडले.
त्याचप्रमाणे, कृष्ण (चेतना, जागरूकता) आपल्या अंत: करणात जन्म घेताच सर्व अंधकार (नकारात्मकता) नाहीसा होतो.
.. सर्व साखळ्या (मी,माझा आदी अहंभाव) तुटल्या आहेत.
आणि तुरुंगातील सर्व दरवाजे आपण स्वतःमध्ये ठेवतो ते (जात, व्यवसाय, संबंध इ.) उघडले जातात.
जगातील सर्वात त्यागसंपन्न पुरुष म्हणजे कृष्ण!!!
.. आई,बाप,गावशीव, राज्य वंश,मैत्रिणी,गोपिका,गोप वेळप्रसंगी सॊडून द्याव्या लागल्या…
पण तो निर्मोही सहजपणे सोडत गेला…गुंतला नाही!!!
Non Judgemental होणे मी त्याच्याकडून शिकतोय!!!
.. त्या योगमायेपासून,कृष्णापासून हेच शिकतोय!!!
.. की गुंतू नका… कार्य करत राहा.
लेखक: श्री क्षणस्थ नील
संकलन व प्रस्तुती : श्री मोहन निमोणकर
संपर्क – सिंहगडरोड, पुणे-५१ मो. ८४४६३९५७१३.
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
☆ “धूसर…” – लेखक – श्री सचिन श. देशपांडे☆ प्रस्तुती – श्री अनिल वामोरकर ☆
जानकीबाई ‘घरकुल’ ह्या वृद्धाश्रमात, पोळ्या करायला जायच्या. रोज सकाळच्याच पोळ्या असत जानकीबाईंना, साधारण साठ – सत्तरच्या आसपास. एवढ्या पोळ्या पुरत असत कारण, कोणी एक खाई तर कोणीतरी कधीतरीच दोन. त्यामुळे पन्नासेक पिकली डोकी असलेल्या त्या वृद्धाश्रमात, इतक्या पोळ्या सहज पुरत असत. संध्याकाळी बरेचजण तसेही फलाहारच करत, तर अगदी काही जणच भात खात असत. पण म्हणजे थोडक्यात जानकीबाईंचं, एक वेळच कामावर जाऊन भागत असे.
तर आजही जानकीबाई नेहमीप्रमाणे पोळ्या करायला आल्या खर्या, पण नेहमीची तरतरी काही नव्हती चेहर्यावर त्यांच्या. वृद्धाश्रमाच्या संचालिकाबाईंच्या ते लक्षात आलं… नी त्यांनी विचारलं जानकीबाईंना, त्यांच्या अशा मुड आॅफचं कारण. जानकीबाईंनी पदर लावला डोळ्यांना नी म्हणाल्या… “लेकाला सांगितलं मी की आज एक दिवस इथल्या सगळ्यांना, पोळ्यांना छानपैकी तूप लाऊन देते… तशाही रोज कोरड्या नी पांढरटच पोळ्या खातात ही सगळी मंडळी… तर तुपाचा जो काही खर्च होईल तो देशील का?…”
तर लेक मला त्याचेच खर्च ऐकवू लागला… मलाही माहितीये की तो एका पतपेढीत शिपाई आहे… त्याची बायको घरीच शिवणकाम करुन, संसाराला थोडाफार हातभार लावते… आणि मला इथे जे काय मिळतात ते… आमची तशीही मारामारच असते गरजा भागवायची… पण म्हंटलं एखाद दिवस जरा काय हरकत आहे, तुपाचा खर्च करायला… करु आपलं आपल्यात अॅडजेस्ट “.
इतकं बोलून पुन्हा डोळ्यांना पदर लावला जानकीबाईंनी, आणि तेवढ्यात कसलासा खमंग नी गोडसर वास आला त्यांना स्वैपाकघरातून. जानकीबाईंनी प्रश्नार्थक बघितलं संचालिकाबाईंकडे… त्याही हसल्या नी खुणेनेच त्यांनी जानकीबाईंना, स्वैपाकघरात जायला सांगितलं. जानकीबाई घाईतच आत गेल्या… आणि हबकल्याच आपल्या लेकाला, सुनेला आणि काॅलेज शिकणार्या नातवाला तिथे बघून. सुन आणि नातू प्रत्येक ताटात पोळी… अ हं… पुरणपोळी वाढत होते. आणि लेक प्रत्येक पोळीवर तुप वाढत होता, अगदी सढळपणे. कोणाला तुप, कोणाला दूध आणि कोणाकोणाला तुप अन् दूध दोन्ही… हे आधीच विचारुन त्याप्रमाणेच ताटं वाढली जात होती. दूध हवं असणार्यांच्या ताटात, दूध भरलेली वाटीही होती. जानकीबाई अगदी पुरत्या भांबावल्या होत्या आता. आपल्या गोंधळलेल्या आईकडे बघून दिलखुलास हसतहसतच, लेक आईपाशी गेला. तोपर्यंत संचालिकाबाईही जानकीबाईंच्या पाठी येऊन उभ्या राहिलेल्या. त्या म्हणाल्या… “जानकीबाई… अहो मला कालच फोन आला होता तुमच्या लेकाचा, आणि त्याने मला सांगितलं होतं की तो हे सगळं घेऊन येणारेय आज इथे… तूम्हाला मात्र काहीही न सांगण्याबद्दल विनंती केली होती त्याने मला”.
जानकीबाईंचा लेक त्यांच्याकडे बघत बोलू लागला…
“आई अगं तू तुपाबद्दल बोललीस… तेव्हाच अगदी माझ्या मनात आलं होतं की, तुपासोबत तर मग पुरणपोळीच हवी… पण म्हंटलं तुला जरा धक्का द्यावा, म्हणून मग तुला नाही जमणार म्हणालो मी… आणि खर्चाचे पाढे वाचले तुझ्यासमोर”.
“अरे पण जे काही खर्च सांगितलेस मला, ते तर खरेच होते ना?… मग आता हा एवढा खर्च इथे झाल्यावर, तिथे कसं काय भागवायचं?”.
“अगं आपल्या घरापासून दोन गल्ल्या सोडून तो नवा टाॅवर झालाय ना, तिथेच मला रात्रीची सिक्युरीटी गार्ड म्हणून नोकरी मिळतीये… रात्री आठ ते सकाळी आठ… बाराशे तरी सुटतील तिथून”.
“म्हणजे तू सकाळी नऊ ते चार पतपेढीत काम करणार… घरी येऊन सुनेनी शिवलेली कापडं लोकांकडे पोहोचती करणार, ते सहाला घरी येणार… आणि पुन्हा आठला घराबाहेर पडणार रात्रीच्या ड्युटीला जायला?… अरे नको रे इतका ताण घेऊ”.
“अगं आई तुझी कुठलीही इच्छा अपुरी राहू नये म्हणून… मी मधल्या त्या सहा ते आठ वेळेतही, कुठे काय मिळतंय का ते बघतोय”.
जानकीबाईंनी डोळे वटारत, लेकाच्या दंडावर जोराची चापटी मारली. सुनेनी आणि नातवानी आत्तापर्यंत वाढलेली ताटं, टेबलवर नेऊन ठेवलेली. सगळी मंडळीही एकेक करुन येत, आता जागेवर बसलेली… ताटात पुरणपोळी पाहून खुललेली. टेबलावर मांडलेल्या खुर्च्यांपैकी, मधली खुर्ची मात्र अजूनही रिकामीच होती. कोणीच बसलेलं नव्हतं तिथे, समोर वाढलेलं ताट असूनही. जानकीबाईंनी काहीतरी उमजून, फक्त पाहिलं लेकाकडे… आणि लेकाने होकारार्थी मान हलवली. जानकीबाईंनी पुन्हा पदर लावला डोळ्यांना, नी त्या जाऊन बसल्या रिकाम्या जागेवर.
नेहमीप्रमाणे वदनी कवळ घेता म्हणायला उठलेले एक आजोबा, सगळ्यांना उद्देशून म्हणाले… “आपल्या सगळ्या लोकांतून… खर्याअर्थी सगळ्यात श्रीमंत अशा जानकीबाईंना, खूप खूप शुभेच्छा आजच्या ‘ज्येष्ठ नागरीक दिनाच्या’… आणि त्यांच्या लेकाकडील ही मनाची श्रीमंती त्याच्या लेकातही, म्हणजेच जानकीबाईंच्या नातवातही अर्थातच उतरली असेल… म्हणून जानकीबाईंच्या सुनेचंही आत्ताच अभिनंदन करतो, तिच्या नशिबी पुढे कधीही वृद्धाश्रम नाही म्हणून “.
…. इतकं बोलून रोज खणखणीत आवाज लावणार्या आजोबांनी, आज काहीशा दाटल्या आवाजातच वदनी कवळ घेता सुरु केलं होतं… ताटावर बसलेल्या जानकीबाईंच्या, अन् वाढायला उभ्या त्यांच्या सुनेच्या भरुन आलेल्या डोळ्यांतून… ‘धूसर’ होत जात.
लेखक: श्री सचिन श. देशपांडे
प्रस्तुती – श्री अनिल वामोरकर
अमरावती
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
☆ मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ ’तृप्तता…’ – लेखक : श्री पराग दामले ☆ प्रस्तुती – श्री अमोल अनंत केळकर ☆ ☆
ते दोघे मूळचे नागपूरचे, सध्या पुण्यात कॉट बेसिसवर राहायला. सगळं रुटीन ठरलेलं… सकाळी लवकर उठून आवरायचं, नायतर टॉयलेटला गर्दी होते, मग कोपऱ्यावर जाऊन नाश्ता करायचा, कधी पोहे, कधी उपमा, साबुदाणा खिचडी, ब्रेड पॅटिस, अगदीच कंटाळा आला की इडली, वडा सांबार….. एक कडक चहा…. तिथून सरळ ऑफिसमध्ये. १ ला डबेवाला येणार. मग लंच, ४ ला चौकात जाऊन चहा….. ६ ला हॉस्टेल…. मोबाईल कुटणे, घरी फोन करणे, इस्त्रीचे कपडे आणणे, येताना एखादा कटिंग, क्रीमरोल नाहीतर वाटी केक….. ९ ला डबा येईल की डिनर….. रात्री बेडवर आडवं पडून एखादा सिनेमा, तोही अर्धवट…. ११ नंतर कधीही झोप…. सगळं अगदी ठरलेल्या प्रमाणे….
खरं तर तेच तेच खाऊन, धोपट मार्गाने जाऊन दोघांना प्रचंड कंटाळा आला होता. गोडधोड खावं, माणसांत मिसळून जावं, मनाला शांतता मिळावी असं आतून वाटत होतं… जसं कॉलेजमध्ये असताना अनोळखी लग्नात किंवा कार्यात जाऊन मस्त पोटभर जेऊन यायचं, असलं काहीतरी शिजत होतं…
रविवार होता… सकाळी निवांतपणे आवरून चक्कर मारायला बाहेर पडले. जवळच एक छोटा कार्याचा हॉल होता… लगबग दिसली, गजरे, लफ्फे नेसलेल्या बायका, झब्बे सुरवर, जॅकेट, पायात करकर वाजणाऱ्या कोल्हापुरी घातलेले बापे….. परकर पोलक्यात आणि शिवलेल्या धोतरात बारकी पोरी पोरं…..
यांच्या डोक्यात सोडियम व्हेपर लागला… गडी खुश…. रूममध्ये येऊन कुर्ता, सुरवर घातला, डिओ ने अंघोळ केली….. अहहह, वऱ्हाडी जणू….
शून्य मिनिटात हॉल गाठला, सहजपणे दरवाजातून आत गेले… दारात एक तरुण उभा होता, अर्थातच यजमान घरातला… यांनी नमस्कार केला… त्यानेही नमस्कार केला… आत गेले…
हा तरुण त्यांच्या मागे गेला, म्हणाला “तुम्हाला कुठेतरी बघितलं आहे, तुम्ही कोणाकडून आहात?…..”
यांची किंचित टरकली….. तरी ध्येयवादी होते त्यामुळे बिनधास्त सांगितलं…. “मुलाचे मित्र आहोत…”
“ओहहहह या या” म्हणत त्या तरुण मुलाने त्यांना बसायला सांगितलं…
हे बोलणं संपलं…..गुरुजींची आरोळी झाली, “ज्यांना पथ्यपाणी असेल त्यांनी जेऊन घ्यावं, मुहूर्ताला वेळ आहे….” एक हशा पिकला, सत्तरीच्या पुढची बरीच यंग इंडिया तिथे होती…. तशी मोजकीच माणसं उपस्थित होती, तीन पिढ्या एकत्र दिसत होत्या… हे दोघे मागे थांबले होते… अगदीच दगा फटका झाला तर कन्नी कापायची…
तो तरुण त्या दोघांच्या जवळ गेला, म्हणाला, “तुम्हाला घाई असेल तर वरच्या हॉलमध्ये जेवायची सोय केली आहे, मुहूर्ताला वेळ आहे, तुम्ही जेऊन घ्या…..”
“नको नको, आहे वेळ अजून. लग्न लागलं की जेवू….”
“अहो ऐका माझं, जेऊन घ्या….”
हो, नाही करत हे दोघे जेवायला गेले…. मोजक्या पदार्थांचा बुफे मांडला होता… सनईचे सूर, उदबत्तीचा घमघमाट होता… वरण, भात… छोटा बटाटावडा आणि हिरवी चटणी, सफरचंदाची कोशिंबीर, मटार उसळ अळणी आणि तर्री वाली, पोळी, दही बुत्ती, सीताफळ रबडी… अहहहहह कसला साधा पण रुचकर मेन्यू आहे असं म्हणत, पान वाढून घेऊन, टेबल खुर्चीवर आसनस्थ झाले….
“ए पाणी पिऊन घे रे, म्हणजे रबडी ओरपता येईल…”
“एक, दोन, तीन, चार…..”
“ए अस मोजू नये रे,” असले डायलॉग मारून, तड येइपर्यंत यथेच्छ जेवले, हात धुवून बनारस पान तोंडात….
तो तरुण इतर पाहुण्यांशी बोलत पुन्हा त्यांच्यापाशी आला…. “काय पोटभर झालं ना जेवण??… सगळं ठीक आहे ना?….”
इतकं आदरातिथ्य बघून या दोघांना गलबलून आलं, तोंडातले पान एका गालात सरकवून…. “वाह अगदी मोजके पदार्थ पण अप्रतिम चव आहे, तृप्त झालो” अशी पावती दिली….
तो तरुण म्हणाला, “चला आता मुहूर्त आला….”
जवळपास वरचा हॉल खाली आला…. गुरुजींनी आरोळी दिली, “नवरा मुलगा आणि नवरीला आणा…..”
सर्वत्र हशा पिकला…. या दोघांनी एकमेकांकडे बघितलं… काही कळायला मार्ग नाही… तो तरुण या दोघांच्या मागे उभा राहिला..
स्टेजवर नवरा मुलगा, मुलगी आले… लग्नी कपडे, मुंडावळ्या, हातात हार…. मंगलाष्टके झाली, सगळ्या मंडळींना कौतुक होतं या सोहळ्याचं….
मुहूर्तावर लग्न लागलं…. हार घातले गेले…. सर्वांच्या कडे तोंड करून दाम्पत्य उभं राहिलं… ७५ गाठलेला वर… सत्तरीची वधू… गोड दिसत होते दोघे..
त्यांना बघून हे दोघे अवाक झाले होते…. हे काय भलतंच सुरू आहे, पोबारा करायची वेळ आली आहे, असं मनात आणत होते…. इतक्यात तो तरुण, या दोघांना मागून म्हणाला, “नवरदेव तुमचा मित्र आहे ना… मी त्यांचा मुलगा आहे, माझ्या आई वडिलांच्या लग्नाला ५० वर्ष पूर्ण झाली म्हणून आज पुन्हा तसाच सोहळा केला…. तुम्ही आत आलात आणि म्हणालात की नवरदेवाचे मित्र आहोत…. तेव्हाच मला समजलं की तुम्ही आमच्या कोणाचेच कोणी नाहीत. पण काळजी करू नका, तुमचा हेतू मला कळला…. मी पण याच वयात आहे….
आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे, देव कोणत्या रुपात येईल सांगता येत नाही आणि भोजनाने तृप्त झालेल्या माणसांचे आशीर्वाद, माझ्या आई वडिलांना मिळाले आहेत, यात मला समाधान आहे…”
काय बोलावं हे न समजता, त्या दोघांनी त्या तरुणाचे आभार मानले आणि नमस्कार करून बाहेर पडले, तृप्त होऊन….. आणि एक प्रकारची मानसिक शांतता त्या तरुणाच्या चेहेऱ्यावर होती….
☆ “कृष्णार्पण.. कृष्णार्पण.. कृष्णार्पण…” – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – सौ. मंजुषा सुनीत मुळे ☆
☆
गोष्ट कधीची ते कुणी कधी नव्हतं सांगितलं …
पण लहानपणच्या आजीच्या गोष्टीतली ही खूप आवडती गोष्ट… सांगायला आजीला आवडायची आणि ऐकायला आम्हाला… आजी कुठलीही असो… पण ही सवय असायचीच..
…. काहीही आपलं कृष्णार्पण म्हणायचं.. जेवण झालं की.. एखादं काम यशस्वी झालं की… अगदी दारावर कुणी आलं आणि भिक्षा.. माधुकरी दिली तरीही कृष्णार्पण..
‘ असं का?? ‘ म्हटलं तर फक्त हसून द्यायचं.. आणि गोष्ट तशी साधीच होती…
एक कीर्तनकार देवळात कीर्तन करायचे तेव्हा देवळातल्या गर्दीत एक म्हातारी एका कोपऱ्यात वाती वळत कीर्तन ऐकायची..
.. एक वात करून बाजूला ठेवली की पुटपुटायची ओठातल्या ओठात… कृष्णार्पण…
कुणाच्या काय.. तिच्याही नकळत घडायचं हे… कीर्तन संपलं की देवाला नमस्कार करायचा, बुवांच्या पाया पडायचं आणि आपलं सामान गुंडाळून घरी परतायचं.
दिवसामागून दिवस जात होते, आणि एक दिवस बुवांचं कीर्तन असं काही रंगलं… आजी ऐकता ऐकता मान डोलवत वाती वळत होती… कृष्णार्पण म्हणत होती…
…. आणि अचानक पुष्पक विमान की हो उतरलं देवळाच्या परिसरात. सगळे अवाक्… कुणासाठी आलं.. बुवांसाठीच असणार.. बुवांनी गाभाऱ्याकडे वळून दंडवत घातलं आणि सगळ्यांचा निरोप घेतल्यासारखं करत पुष्पक विमानाकडे प्रस्थान ठेवलं…
बसलेल्या म्हाताऱ्याकोताऱ्यांमधून वाट काढत दूत पुढे जात होते.. प्रत्येकाच्या मनात उमललेली, ‘माझ्यासाठी …?’ ही आशा क्षणात मालवत होती… ‘आपण नाही तर कोण???’ उत्सुकतेने नजर दूतांचा मागोवा घेत होती… कोण…?
‘आज्जी… आजी…’
‘ काय रे..? कृष्णार्पण..’ वात जुडीत ठेवत आजी विचारत्या झाल्या..
‘ तुम्हाला न्यायला आलोय…’
‘ थांब रे बाबा.. ह्या दोन वाती झाल्या की झालंच… बुवांचं कीर्तन का थांबलंय…? ’
‘ देवांनी बोलावणं धाडलंय… ‘
‘ बुवाsss ’…. आजींनी वर बघितलं तर बुवा हातात हार आणि कपाळावर नाम काढायची तार घेऊन नतमस्तक उभे होते…
‘आजी, चला…’
एव्हाना वातींची जुडी झाली होती.. कृष्णार्पण म्हणत आजींनी ती कनवटीला लावली… चष्म्याच्या भिंगातून बारीक डोळ्याने सगळं न्याहाळत बोलल्या,
‘ देवाचं बोलावणं … निघते आता…’
का..
कशाला..
कुठे..
कसलाच प्रश्न ना मनात आला आजींच्या ना चेहेऱ्यावर.. ना ओठांवर…
…. ‘ तुकारामांना आलं होतं विमान … तसंच त्या आजींना ही … नशीबवान गो बाय…कृष्णार्पण…’ माझी आजी सुस्कारायची..
खूप मोठी होईपर्यंत कधी कळलंच नाही… नक्की गोष्टीत काय घडलं आणि का घडलं…?
दरम्यान आजीही देवाघरी गेली…
…. एकदा अशीच गावी गेले होते… गावचं देऊळ आमच्या वाड्याच्या चौकात …
देवळात बुवा आजीचीच गोष्ट सांगत होते..
“कृष्णार्पण… कृष्णार्पण … कृष्णार्पण…”
.. मी क्षणात जीवाचा कान करून खांबाला टेकले… एव्हढ्या सगळ्यांमध्ये देवांनी पुष्पक आजींसाठीच धाडलं…
.. बुवा बोलत होते… आयुष्याचा प्रत्येक क्षण निरिच्छपणे जगत आजी कृष्णाला अर्पण करत होत्या… आयुष्य जसं येत होतं तशा सामोऱ्या जात होत्या.. “का रे बाबा मीच.. “म्हणून विचारत नव्हत्या….. मिळाल्याची ना असोशी होती.. ना न मिळाल्याची खंत… इतकं की देवाचं बोलावणंही कुठल्याही प्रश्नाशिवाय मान्य झालं…
☆ “अधिपत्य” – लेखक – अज्ञात☆ प्रस्तुती – श्री अनिल वामोरकर ☆
दोघेही खूप दिवसांनी जोडीने मॉल मध्ये गेले होते, एरवी मुलं बसमधून शाळेत गेली की तो ऑफिसमध्ये जाई आणि ती घरातलं काम आवरे, सासू सासऱ्यांना वेळेवर नाष्टा आणि जेवण देण्यासाठी भराभर कामं आटोपण्याच्या मागे ती लागे, पण आजचा दिवस खूप वेगळा होता तिच्यासाठी, मुलांची बस येणार नव्हती, सासू सासरे एका लग्नासाठी दोन दिवस गावी गेलेले आणि त्याला सुट्टी होती, तो म्हणाला, “सकाळी लवकर आटोपून घे, मुलांना शाळेत सोडू आणि तसंच फिरायला जाऊ परस्पर, येतांना मुलांना घेऊन येऊ”
नेहमीच्या रुटीनपेक्षा वेगळा दिवस म्हटल्यावर तिला चुकल्या चुकल्यासारखं झालं, लग्नानंतर फिरायला गेलेले दोघे, त्यानंतर बहुदा पहिल्यांदा दोघे बाहेर जात होते, एरवी जात, पण लग्न समारंभात किंवा वाढदिवसालाच फक्त… नाहीतर सासू सासरे सोबत असताना, तिने छानपैकी तयारी केली, दोघेही निघाले, मुलांना शाळेत सोडलं, तिला खूप वेगळं वाटत होतं, स्वयंपाकाला उशीर होईल, घरातली कामं बाकी आहेत याची हुरहूर लागायची, पण मग सासू सासरे घरात नाही असं आठवलं की परत निर्धास्त होई, त्याने मॉलकडे गाडी वळवली, मॉल मधली मोठमोठे शॉप बघत दोघे चालत होते, ती तिथल्या बायकाही बघत होती, वेगवेगळ्या प्रकारचे शॉर्टस, वनपीस..मेकप मध्ये असलेल्या तिच्यातून अधिक वयाच्या बायका, एकदम मॉडर्न..अन तिला उगाच वाटत होतं की आज तिनेच छान तयारी केली होती,जग खूप पुढे गेलेलं, स्त्रिया खूप बदलल्या होत्या, पण ती अजूनही तशीच होती, पंजाबी ड्रेस, अंगभर ओढणी, साईडच्या दोन लट मध्ये घेऊन लावलेलं क्लचर…
एका दुकानापाशी थांबली, होम डेकोर चं साहित्य होतं तिथे, ती हात लावून एकेक बघत असतांना तो म्हणाला, “साधं प्लास्टिक आहे हे, काहीं कामाचं नाही, चल इथून” ते प्लॅस्टिक नसून एक चांगल्या क्वालिटीचं मटेरियल होतं, “हे मटेरियल वेगळं वाटतंय ना जरा?”
“काही वेगळं नाही, तुला नाही समजत त्यातलं..तू चल इथून..”
ती निघाली,
पुढे एका भांडयांच्या दुकानात ती थांबली,
चांगल्या धातूच्या सुंदर कढई बघू लागली,
पोहे करायला एक कढई लहान व्हायची तिला, आणि भाजीला दुसरी कढई मोठी व्हायची, ही कढई अगदी परफेक्ट दिसतेय, तिला आनंद झाला..
तो म्हणाला, “जड आहे खूप”
“चांगल्या धातूची दिसतेय म्हणून”
“असं काही नसतं, तुला नाही कळत त्यातलं..चल”
तिने कढई तिथेच ठेवली आणि पुढे निघाली,
नाष्टा करण्यासाठी ते टेबलापाशी बसले,
ती म्हणाली मी मुलं खातात तसा पिझ्झा खाणार,
तो म्हणाला, मी ऑर्डर देऊन येतो..
“मी जाऊ का? तुम्ही बसा”
तो हसला,
“तुला नाही जमणार..मॉल मध्ये आहोत आपण, कोपऱ्यावरच्या साई वडापाववाल्याकडे नाही..”
तो म्हणाला, तीही हसली..तिनेही आपलं “न जमणं” मान्यच केलेलं..
तो काउंटर वर गेला, गर्दी होती तिथे,
ती आजूबाजूला बघू लागली,
एका ठिकाणी एक कार्यक्रम चालू होता,
मॉलमध्ये त्या फ्लोर च्या मधोमध एक छोटासा स्टेज होता, आजूबाजूला बरीच गर्दी होती, माईकवरुन आवाज येत हो..
काय असेल? तिला कुतूहल वाटलं..
नवरा लाईनमध्ये उभा होता, त्याला वेळ लागेल हे लक्षात येताच ती स्टेजजवळ गेली,
“Now next contestant? Please step forward”
तिथे वेगवेगळे खेळ खेळले जात होते, सगळ्या सो कॉल्ड मॉडर्न बायका हिरीरीने भाग घेत होत्या, ती बघायला पुढे गेली आणि स्पर्धकांमध्ये केव्हा लोटली गेली तिला कळलंच नाही, तिथल्या मुलांनी ती आणि तिच्या बाजूच्या चार बायकांना पुढे यायला सांगितलं तसा तिला घाम फुटला..
अरे देवा, हे कुठलं संकट…!
ती मागे फिरू बघत होती पण तो मुलगा ओरडला,
“ओह मॅडम, तिकडे कुठे, इकडे या”
ते ऐकून ती अजूनच घाबरली,
स्टेजवर जाऊन आपल्या नवऱ्याला शोधू लागली, तो अजून लाईनमध्येच होता आणि त्याचं लक्षही नव्हतं…
त्या पाच बायकांना एक खेळ खेळायचा होता,
इंग्रजीमधले अवघड स्पेल्लिंग त्यांना बोर्डवर लिहायला लावणार होते, ज्याचं चुकलं तो आऊट होणार होता..
तिला दरदरून घाम फुटला,
सगळ्या बायका शिकलेल्या, इंग्रजी बोलणाऱ्या, ला कुठे काय येत होतं?
त्यांना पहिला शब्द दिला..
लेफ्टनंट…
सगळ्या बायकांनी बोर्डवर लिहिलं,
तिला आठवलं,
सासऱ्यांचा एक मित्र लेफ्टनंट होता, त्याची बातमी इंग्रजी वृत्तपत्रात छापून आलेली, तिने ती बातमी आणि नाव खूप वेळा वाचून काढलेलं..
तिने बरोबर स्पेल्लिंग लिहिलं,
बाकीच्या 2 जणी आऊट झाल्या, 3 उरल्या,
पुढचं स्पेल्लिंग, बुके..
तिला आठवलं, मुलांचे तापसलेले पेपर घरी आलेले तेव्हा मुलाने हे स्पेल्लिंग चुकवलं होतं, टीचरने करेक्ट स्पेलिंग लिहून दिले..ते तिच्या लक्षात होतं,
एक बाई आऊट झाली,
आता फक्त ती आणि दुसरी एक बाई उरली,
पुढचं स्पेलिंग, रेस्टरन्ट..
तिच्या डोक्याला मुंग्या आल्या, सगळं गरगर फिरायला लागलं, तिला हे काही येत नव्हतं, डोळ्यात पाणी जमू लागलं..
नवीन लग्न झालं तेव्हा सासरचा जाच ती आईकडे बोकून दाखवायची, तेव्हा आई बोलायची ते वाक्य आठवलं, “उत्तरं आपल्या आजूबाजूलाच असतात..फक्त नजर तीक्ष्ण हवी”
तिला येईना, तिने आजूबाजूला पाहिलं,
लक्षात आलं, नवरा जिथून ऑर्डर घेत होता तिथेच वर लिहिलं होतं,
“कॉंटिनेंटल restaurant”
तिने ते वाचलं, बोर्डवर लिहिलं..
दुसऱ्या स्त्रीने चुकवलं होतं,
ती जिंकली,
सर्वांनी टाळ्या वाजवल्या,
तिकडे नवरा ट्रे घेऊन बायकोला शोधत होता,
माईकवर तिचं नाव ऐकलं तसा तो ट्रे टेबलवर ठेऊन तिकडे पळाला,
त्याला सगळं समजलं, तो हैराण झाला..
सर्वांनी तिचं अभिनंदन केलं,
सोबतच्या मॉडर्न आणि इंग्रजी बोलणाऱ्या बायकांना ही साधी स्पेलिंग जमली नव्हती, मॉडर्न कोणाला म्हणावं मग? तिला प्रश्न पडला…
ती आनंदाने त्याच्यापाशी आली,
“तू आणि इंग्रजी स्पेल्लिंग खेळात जिंकलीस? पहिली दुसरीतली स्पेल्लिंग विचारलेली की काय? हा हा हा” तो या गोष्टीकडे गम्मत म्हणून बघून हसत होता,
“अशी स्पेल्लिंग होती जी तुम्हालाही जमली नसती”
“मग तुला कशी जमली?”
“कसं आहे ना,
आजवर तूला काही जमणार नाही, तुला काही समजत नाही, तुला काही येत नाही हेच ऐकत होते आणि त्यावर माझाही विश्वास बसलेला..तुम्ही सोबत होतात तेव्हा याच गैरसमजात असायचे मी..पण आज तुमच्यापासून काही काळ दूर गेले आणि मी स्वतःला गवसले…कदाचित, उशिराच…”
तो खजील झाला, त्याच्या नजरेत ते दिसू लागलं..
नजर चुकवत तो पिझ्झा खाऊ लागला, सोबत आलेलं सॉस चं छोटं पॅकेट फोडायचा प्रयत्न करू लागला, काही जमेना..
तिने त्याच्या हातातून ते घेतलं आणि म्हणाली,
“सोडा, तुम्हाला नाही जमणार”
जोडीदाराचा प्रयत्न असला पाहिजे की माझ्याइतकाच माझा जोडीदार सक्षम व्हायला हवा, प्रत्येक ठिकाणी जोडीदाराला कमी समजून स्वतः पुढे होणं याला संसार नाही, *अधिपत्य गाजवणं * म्हणतात.
लेखक : अज्ञात
प्रस्तुती – श्री अनिल वामोरकर
अमरावती
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
☆ “Less luggage, more comfort…” – लेखक : श्री सचिन मधुकर परांजपे ☆ प्रस्तुती – सुश्री सुनीला वैशंपायन ☆
☆
“Less luggage, more comfort…”
वयाच्या ८९ व्या वर्षी ती शेवटच्या ग्लानीत होती. काही शेवटचे क्षणच उरले असावेत बहुधा. तिने किंचित डोळे उघडले.
तो जवळच होता. नुकताच आला असावा कदाचित.“चला, निघूया का आपण? मलाही उशीर होतोय. काही उरलंसुरलं असेल तर….” तो किंचित हसला. तिने त्याचा हात हातात घेतला आणि म्हणाली, “तसं फार काही नाही पण मी काहींना माफ करणार नाही मरेपर्यंत…ती वाशीची कुमुद, माई सावंत, दिगंबर मुसळे आणि विद्याताई….”
“का बुवा?” मरणासन्न अवस्थेतही तिचा तो निर्धार बघून त्याला हसू आवरेना..
“का म्हणजे काय? या सगळ्यांनी आयुष्यभर छळलंय मला. अपमान, पदोपदी अपमान केलेत. तोंडाला येईल ते बोललेत. माझ्या माहेरचे उध्दार केलेत. प्रॉपर्टीवरुन वीस पंचवीस वर्षे कोर्टकज्जे चालवलेत हरामखोरांनी. त्या विद्याने तर माझा नवरा…. कधीच माफ करणार नाही”
तो उठला होता तो क्षणभर बसला. त्याने तिचा हात नीट धरला, “बरं…पण आता तुझ्या माफ न करण्यानं काय होईल? त्यावेळी तु प्रतिकार करु शकली नाहीस. नंतर कधी केला नाही. आणि आता माफ न करण्याचं ओझं शिरावर कोण घेऊन बसलंय? कुमुद याक्षणी वृध्दाश्रमात खितपत आहे. विद्याताई लंडनला मुलीकडे आहे मजेत असं तुला वाटतंय पण तिथे ती हक्काची मोलकरीण झालीये, वैतागलीये पण बोलणार कुणाला? दिगंबर मुसळे निजधामाला जाऊन दहा वर्षे झाली. माई सावंत अशाच कुठल्यातरी अज्ञातवासात…. नियती बघते काय ते? आणि तु तरी कुठे गं धुतल्या तांदळासारखी आहेस? तुझ्या हातूनही असंख्य चुका, अपमान झालेच आहेत की…. तु त्यांना माफ न करुन आता काहीच फरक पडत नाही. पण तुझ्या माथ्यावर ओझं मात्र झालंय खूप… ऐक एक, ते ओझं इथेच टाक, माफ कर आणि चल माझ्यासोबत”
“तुला काय जातंय बोलायला? मी सोसलंय”
“हो मान्य आहे. पण आता काय? एका ठराविक क्षणी याला काहीच अर्थ उरत नसतो. तु माफ न करुन आता काय होणार आहे नेमकं? तुला तर साधं बोटंही हलवता येत नाही. इथून जाताना ही विषारी आणि विखारी ओझी का नेतेयस? त्यावर पुढे खूप व्याज वाढतं. शिक्षा देणारी ती नियती आहे. तू नव्हेस…. तुला एक सांगू? प्रवासात एक गोष्ट कायम लक्षात ठेव. Less luggage, more comfort…”
ती अस्फुट हसली…. “करते रे बाबा माफ सगळ्यांना… ओझी कधीतरी उतरवायला हवीतच. हो ना?”
“परफेक्ट…” तो म्हणाला… आणि अर्धवट ग्लानीतला तिचा देह आता चिरनिद्रेत जाऊ लागला… तो एव्हाना तिला घेऊन खोलीबाहेर पडला.. आता ओझं हलके झाले होते…
☆
लेखक: श्री सचिन मधुकर परांजपे
(पालघर)
प्रस्तुती : सुश्री सुनीला वैशंपायन
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈