मराठी साहित्य – विविधा ☆ अधिक मास : महात्म्य!… २ ☆ श्री नागेश शेवाळकर ☆

श्री नागेश शेवाळकर

? विविधा ?

अधिक मास : महात्म्य!… २ श्री नागेश शेवाळकर

चित्रबाहू राजाची कहाणी!

महालक्ष्मी विष्णुला म्हणाली, “नाथ, आपण पुरुषोत्तम मासामध्ये दीप प्रज्वलनाची खूप छान माहिती सांगत आहात. आपली वाणी रसाळ आहे त्यामुळे ऐकावेसे वाटते… “

“देवी, तुझी ज्ञानलालसा पाहून मी तुला कथा सांगतो…

सौभाग्य नावाचे एक नगर होते. त्या नगरीचा चित्रबाहू नावाचा राजा होता. तो खूप शूर होता. अत्यंत धार्मिक वृत्तीचा होता. तो कृष्णाची भक्ती करत असे. दानधर्म करणे ही त्याची आवड होती. एकदा अगस्ती ऋषी त्याच्याकडे आले. चित्रबाहूला खूप आनंद झाला. राजाने ऋषी अगस्ती यांचे स्वागत केले. त्यांची पूजा करताना स्तुतीगान केले. राजा म्हणाला, “ऋषीवर, ‌आपण आलात, मी धन्य झालो. मी माझे राज्य आपल्या चरणी अर्पण करतो. “

“राजा, तुझे राज्य मला नको. तुला भेटून मलाही समाधान वाटले… ” ऋषी बोलत असताना राजाची राणी चंद्रकला तिथे आली. तिने ऋषीला नमस्कार केला. चित्रबाहू राजा म्हणाला,

“ऋषीवर, मला कधीकधी असा प्रश्न पडतो की, माझे असे कोणते पुण्याचे काम आहे की, मला राजपद मिळाले. मोठे वैभव प्राप्त झाले. चंद्रकलेसारखी गुणवान पत्नी मिळाली. “

अगस्ती ऋषी काही क्षण डोळे लावून बसले. थोड्या वेळाने डोळे उघडून‌ ते म्हणाले, “मी डोळे लावून‌ बसलो होते तेव्हा मला तुझ्या पूर्व जन्माची हकिकत समजली. चमत्कार नावाचे एक नगर होते. त्या शहरात मणिग्रीव नावाचा एक मानव राहत होता. मणिग्रीव म्हणजे तू! या जन्मात जसा तू सदाचारी आहेस तसा त्या जन्मात नव्हता. तू अत्यंत पापी होता. तुझ्या पत्नीचे नाव सुंदरी होती. सुंदरी म्हणजेच चंद्रकला! पापी पतीसोबत सुंदरी पत्नीधर्म पाळत त्याच्यासोबत राहत होती. मणिग्रीवाच्या वाईट कामाला, त्रासाला त्याच्या गावातील लोक कंटाळले होते. गावकऱ्यांनी मणिग्रीवाला गावातून‌ हाकलून दिले. बृहद्बल त्या राज्याचा राजा होता. त्याने त्याची सारी संपत्ती जप्त केली. त्याला पत्नीसह जंगलात हाकलून दिले.

अरण्यात राहत असलेले मणिग्रीव आणि त्याची पत्नी प्राण्यांची शिकार करून‌ भूक भागवत असत. त्या दोघांना त्या अरण्यात राहताना बराच काळ झाला. एकेदिवशी त्या अरण्यातून एक तपस्वी जात होता. त्याचे नाव उग्रदेव होते. चालताना थकल्यामुळे उग्रदेवाला चक्कर आली. तो जमिनीवर कोसळला. मणिग्रीव आणि त्याच्या पत्नीने त्याला पाहिले. मणिग्रीवाने त्याच्यावर उपचार केले. उग्रदेव शुद्धिवर येताच त्याला मणिग्रीवाने आपल्या घरी आणले. त्याला फलाहार दिला. मणिग्रीवाने त्याची विचारपूस केली.

“मी यात्रेकरू आहे. चालताना माझा रस्ता चुकला. या अरण्यात फिरत असताना खूप श्रम झाल्यामुळे तसेच खूप भूक लागल्यामुळे गरगरल्यासारखे झाले. मी खाली कोसळलो. बेशुद्ध झालो. तुम्ही मला जीवदान दिले. तुम्ही दोघे या अरण्यात का राहता? तुम्ही कोणत्या नगरीचे आहात. मला तुमची काही मदत करता आली तर आनंद होईल. ” उग्रदेवाने म्हणाला. मणिग्रीव त्याची सारी कहाणी उग्रदेवाला ऐकवून म्हणाला,

“मी अनेक दुष्कृते केली आहेत. त्याची शिक्षा म्हणून मी या अरण्यात राहत आहे. माझ्या या साऱ्या प्रवासात माझी पत्नी माझ्यासोबत राहिली. तिची काहीही चूक नसताना तिला अशी शिक्षा भोगावी लागत आहे. सध्या आम्ही फार दुःख भोगत आहोत. यातून बाहेर पडण्याचा नि सुख, ‌शांती, सदाचाराने राहता येईल असा मार्ग मला सांगावा. “

“तू माझी सेवा केलीस. माझा जीव वाचवलास यामागे निश्चितच काहीतरी ईश्वरी संकेत आहे. तुम्हा दोघांचा भाग्योदय मला समोर दिसत आहे. काही दिवसांतच पुरुषोत्तम मास सुरू होत आहे. या महिन्याचे महत्त्व अलौकिक आहे. पुरुषोत्तम मासात भगवान श्रीकृष्णाची मनोभावे पूजा करावी. कृष्णमूर्तीसमोर संपूर्ण महिना नंदादीप लावावा. देवाला नैवेद्य दाखवावा. हे व्रत अत्यंत लाभदायक आहे. हे व्रत केल्याने तुमचा हा अरण्यवास संपुष्टात येईल असा मला विश्वास आहे. ” असे सांगून उग्रदेव पुढील यात्रा करण्यासाठी निघून गेला.

लवकरच पुरुषोत्तम मास आला. मणिग्रीव आणि सुंदरीने उग्रदेवाने सांगितल्याप्रमाणे श्रीकृष्णाची मनोभावे, यथोचित पूजा केली. त्याचे फळ त्याला मिळाले. मणिग्रीवाच्या स्वभावातील उग्रता नष्ट झाली. मनाला अभूतपूर्व शांती मिळाली. दुष्कर्म करण्याची वृत्ती नाहीशी झाली…

वरील सारा वृत्तांत कथन करून अगस्ती ऋषी म्हणाले, “चित्रबाहू, असा आहे तुझा मागचा जन्म. उग्रदेवाने सांगितल्याप्रमाणे तू पुरुषोत्तम मासामध्ये भगवान श्रीकृष्णाची मनोभावे सेवा करताना संपूर्ण महिना दीप लावला. ते पुण्य गाठीशी होते म्हणून या जन्मात हे सारे वैभव‌ तुला प्राप्त झाले. ” असे सांगून अगस्ती ऋषिंनी चित्रबाहू राजाचा निरोप घेतला…

“नाथ, आपण अत्यंत सोप्या भाषेत चित्रबाहू राजाची कहाणी मला ऐकवली. मला खूप समाधान मिळाले… ” लक्ष्मीदेवी अत्यंत प्रसन्नतेने म्हणाली.

००००

फलदायी मौनव्रत!

श्री लक्ष्मी आणि भगवान विष्णू बोलत असताना लक्ष्मी म्हणाली, “भगवान, आपण सांगितलेल्या कथा ऐकून पुरुषोत्तम मासाबद्दल म्हणजेच त्या मासाच्या कथा ऐकण्याची उत्कट इच्छा होत आहे. एखादी गोष्ट सांगाल‌ का?”

“देवी लक्ष्मी, आपली इच्छा जाणून मी मौनव्रताची माहिती सांगतो… “

“मौनव्रत? म्हणजे चक्क बोलायचेच नाही… “

“होय! तेही संपूर्ण पुरुषोत्तम मास मौन‌ पाळायचे… “

“काय? महिनाभर बोलायचे नाही? कसं शक्य आहे? तेही पृथ्वीवरील मानवाला?”

“का शक्य नाही? भक्ती करणे साधी गोष्ट नाही. कठीण तपस्या केली तर त्याचे फळही तसेच मिळते. “

“देवा, मला मौनव्रताची माहिती द्यावी. “

“देवी, व्रताची माहिती नक्की देईन‌ पण आपण मौनव्रत धारण करू नका… ” असे म्हणत श्रीविष्णू हसले. सोबत लक्ष्मीही हसली.

“ऐका, आता. मौनव्रत म्हणजे पुरुषोत्तम मासामध्ये दररोज एक वेळ जेवण करायचे आणि जेवण होईपर्यंत बोलायचे नाही… “

“देवा, ‌आपण पण असे आहात ना!‌ अहो, महिनाभर मौन‌ ही कल्पनाच अंगावर भीतीचे शहारे आणणारी आहे. फक्त जेवताना बोलायचे नाही हे व्रत त्यामानाने सोपे वाटत असले तरीही ते तितके सोपे नाही. भगवान, मला सांगा, हे व्रत कुणी केले आहे का?”

“हे व्रत मुनीवरांनी केले आहे. “

“काय? देवर्षी नारदांनी‌ हे व्रत केले आहे? कधी, का, कशासाठी?”

“सांगतो. पूर्वीच्या जन्मात नारद मुनी दासी पुत्र होते. पुरुषोत्तम मासात हे मौनव्रत धारण केल्याने पुण्य मिळते म्हणून त्या दासी पुत्राने ते व्रत मनोभावे केले. हे व्रत केल्याने त्याला साधुंचा सहवास लाभला. साधुंच्या सोबत कुरुक्षेत्र येथे त्याने अधिक मासाचे औचित्य साधून तीन दिवस मौनव्रत पाळले. त्यामुळे ब्रह्मदेव प्रसन्न झाले. त्यांनी नारदाला अनेक विद्यांची शिकवण दिली. आपल्या शिष्याला त्यांनी मानसपुत्र मानले. असा आहे मौनव्रताचा महिमा तोही अधिकमासातील!”

“महाविष्णू, मुनीवराची ही माहिती मला नव्हती. आपण ती सांगितली. मी धन्य झाले. “

“लक्ष्मीदेवी, प्रत्यक्ष इंद्रदेवाला या व्रताचा फायदा झाला हे तुला माहीत आहे का?”

“काय सांगता? इंद्रदेवाने मौनव्रत पाळले पण का? अशी कोणती वेळ इंद्रावर आली की, त्यांनी मौनव्रत धारण केले. “

“सांगतो ऐक. पूर्वी अवंतीनगरात एक ब्राह्मण राहत होता. त्याचे नाव वेदशर्मा! तो अत्यंत ज्ञानी, योगी होता. वेदशर्मा वृद्ध झाला असताना अधिकमास आला. तेव्हा वेदशर्माने उपवास करण्याचा विचार केला. परंतु तो शरीराने थकला होता. इच्छा प्रबळ होती परंतु शरीर साथ देईल का नाही ही शंका होती. तो विचारात असताना चमत्कार घडला. एका रात्री त्याला स्वप्न पडले. ‌‌स्वप्नात एक दिव्य पुरूष अर्थात देव आले. ते म्हणाले, “वेदशर्मा, तू तुझ्या प्रबळ इच्छाशक्तीच्या जोरावर उपवासाचे व्रत निश्चितच करू शकशील. तू मौनव्रत अवश्य कर. “

ते स्वप्न म्हणजे ईश्वरी संकेत मानून वेदशर्माने मौनव्रत धारण केले. ईश्वरी शक्ती पाठीशी असल्याने त्याने ते व्रत पूर्णत्वास नेले. त्याच्या भक्तीने प्रसन्न झालेल्या श्रीकृष्णाने त्याला दर्शन दिले. त्याला आशीर्वाद देताना वरदानही दिले. त्यामुळे वेदशर्माने परोपकाराची अनेक कामे केली. त्याचे भाग्य फळाला आले. त्याला श्रीविष्णुने विमान पाठवून वैकुंठात नेले. वैकुंठात जात असताना प्रत्यक्ष इंद्राने त्याला थांबवले. इंद्र म्हणाला, “वेदशर्मा, तू पुण्यवान आहेस. सध्या माझे वृत्रासुरासोबत युद्ध सुरू आहे. तू पुरुषोत्तम मासामध्ये मौनव्रत पाळले होते. तुला त्याचे फळ मिळाले. माझी अशी इच्छा आहे की, तुला जे फळ प्राप्त झाले आहे, त्यापैकी फक्त एका दिवसाचे पुण्य मला द्यावे. त्यामुळे मी वृत्रासुरासोबतचे युद्ध खातरीने जिंकू शकेल. ” इंद्राची इच्छा परोपकारी वृत्ती असलेल्या वेदशर्माने तत्काळ पूर्ण केली. तो वैकुंठात निघून गेला. इंद्रदेवाने वेदशर्माकडून प्राप्त झालेल्या फळामुळे वृत्रासुराचा युद्धात पराभव केला…

“देवी लक्ष्मी, असा आहे, अधिक मासातील मौनव्रताचा फायदा किंवा फळ!”

“भगवान, खरे आहे. मौनव्रत हे तसे कठीण वाटत असले तरीही त्याचे फळ मात्र अलौकिक आहे. ” लक्ष्मी म्हणाली.

००००

अधिक मासातील पर्वकाळ!

भगवान विष्णू आणि महालक्ष्मी यांच्या संवादातून भक्तांना‌ अधिक मासासंदर्भात महत्त्वपूर्ण माहिती मिळत होती. लक्ष्मीने विचारले, “माधवा, मला एका गोष्टीची उत्सुकता लागली आहे. ती म्हणजे, अधिक मासात कोणते पर्वकाळ येतात? त्याची वैशिष्ट्ये नि त्यापासून भक्तांना होणारे लाभ याबाबत माहिती सांगावी. “

“अवश्य!‌ देवी, मला माहिती आहे, हे प्रश्न तू स्वतःसाठी नव्हेतर भक्तांच्या ज्ञानासाठी, उत्कर्षासाठी विचारत आहेस. पुरुषोत्तम मासात व्यतिपात, पोर्णिमा, वैधृती, द्वादशी तसेच अमावस्या हे पाच पर्व येतात. व्यतिपात या पर्व काळात उपासनेमुळे यमधर्म समाधानी होतो. व्यतिपाताच्या दिवशी सुवर्ण दानाचे महत्त्व आहे, तप करून आणि तेरा फळे दान केल्यास पुण्यफळ मिळते. जे भक्त पोर्णिमेच्या दिवशी धार्मिक विधी करतात तेव्हा प्रत्यक्ष ब्रह्मदेवाचा आशीर्वाद मिळतो. ज्या दिवशी वैधृती असते त्यादिवशी स्नान, होमहवन आणि दान करतो त्या भक्ताला इच्छित ते सारे मिळते. पुरुषोत्तम मासातील द्वादशीचा योग साधून खुद्द पुरुषोत्तम प्रसन्न होतो. अमावस्या हे अधिक मासातील शेवटचे पर्व! यादिवशी आपल्या पितरांचे स्मरण करून यथाविधी, यथाशक्ती दानधर्म, अन्नदान केल्यास आपले पूर्वज आनंदी होतात. “

“हरीहर, पाच पर्वांची माहिती नि चार पर्वांचे महत्त्व खूप छान, सोप्या भाषेत सांगितले. त्रिविक्रमा, आता द्वादशी ह्या पर्वाचेही महत्त्व सांगावे. “

“रमादेवी, आपण किती एकरुप होऊन ऐकत आहात हे या प्रश्नावरून लक्षात येते. आपली जिज्ञासू वृत्ती खरेच वाखाणण्याजोगी आहे. ऐक. अधिक मासातील एकादशीला उपवास करावा. द्वादशीचे महत्त्व अपरंपार आहे. कुण्या भक्ताला अनेक तीर्थयात्रांचे पुण्य घरबसल्या मिळवायचे असेल तर त्याने आवळीच्या झाडाजवळ जावे. त्या झाडाच्या बुंध्याशी (अर्थात जे झाड नैसर्गिकरित्या नष्ट झालेले असते. परंतु जमिनीवर खोडाचा भाग शिल्लक राहतो) केलेले पिंडदान थेट आपल्या पूर्वजांना मिळते. तसेच ब्राह्मणाला अन्नदान करावे. शक्य असेल त्याने पुढील दाने अवश्य करावीत ती म्हणजे भूमीदान, वस्रदान, गोमाता दान करावे. तुप मिसळून‌ केलेले अन्नदान करावे. हे दान खूप फलदायी आहे. विष्णुप्रिये,

तुझी ज्ञानलालसा पाहून तुला दानाची अधिक माहिती देतो. व्यतिपात, द्वादशी आणि पोर्णिमा या तीनही दिवशी किंवा कोणत्याही एकादिवशी तुपामध्ये तेहतीस अनारसे तळावेत. त्यावर स्वच्छ कापड झाकावे. त्याची पूजा करावी. भोजन दक्षिणेसह ते ब्राम्हणास दान करावे. म्हणजे भरपूर पुण्य मिळते. असा आहे अधिक मासातील पर्वकाळाचा महिमा!”

” हे पद्मनाभा, खरेच अधिक मासातील पर्वकाळाची माहिती आपण खूप छान सांगितली आहे. श्रीहरी!”

 ००००

पुरुषोत्तम मास: स्नान महात्म्य!

पुरुषोत्तम मासाच्या कथा तन्मयतेने ऐकणाऱ्या लक्ष्मीदेवीने पतीला विचारले, “हृषिकेशा, आपण अधिक मासाची भरपूर माहिती दिली आहे. आता फक्त एकच सांगावे, या मासात स्नानाचे काही महत्त्व आहे का?”

“देवी, ‌अगदी योग्य विचारलेस, त्यासंदर्भातील तुला एक कथा सांगतो. त्या कथेतून तुला स्नानाचे महत्त्व समजून येईल. ऐक. शिवपुरी नावाचे एक नगर होते. हे नगर शंकराला अतिशय प्रिय होते. गोकर्ण पर्वताच्या सान्निध्यात हे नगर वसलेले होते. नगरातील लोक अत्यंत धार्मिक वृत्तीचे होते. पूजा, भजन, वेदमंत्र, प्रवचन, कीर्तन यात रमणारे नागरिक सतत धर्मकार्ये करत. अशा या पावन भूमीत विप्रदास नावाचा मनुष्य राहत होता. सोबत त्याची पत्नी होती. दोघेही सत्शील, धर्मपरायण होते. धार्मिक विधी ते आवडीने करत. गोकर्णाच्या पायथ्याशी गोकर्णी नावाची नदी होती. तिथेच एक शिवलिंग होते. सारणेश्वर या नावाने ते शिवलिंग प्रसिद्ध होते. गोकर्णी नदीत स्नानाचे अपरंपार महत्त्व होते. अधिक मासाचे औचित्य साधून विप्रदासाने त्याच्या पत्नीसह संपूर्ण महिना नदीत स्नान केले. महिन्याच्या शेवटी केलेल्या कार्याचे उद्यापन केले. ब्राह्मणांना भोजन-दक्षिणा देऊन दोघेही मोठ्या आनंदाने घरी निघाले. थोडे चालून जाताच शेकडो प्रेतात्मे अचानक त्यांच्यासमोर आले. दिसताक्षणी कुणीही घाबरेल असेच त्यांचे राहणीमान होते. परंतु विप्रदास घाबरला नाही. तो निर्भीडपणे त्या प्रेतात्म्यांच्या समोर उभा राहिला. त्या प्रेतात्म्यांनीही विप्रदासाकडे पाहिले. त्याचा परिणाम असा झाला की, त्या प्रेतात्म्यांची क्रुरशक्ती नष्ट झाली. अनेक प्रेतात्मे शांत झाले परंतु बरेचसे प्रेतात्मे क्रुर दिसत होते. त्यांच्याकडे पाहताच विप्रदासाची पत्नी खूप घाबरली. ती दूर जाऊन लपली. विप्रदासाने प्रेतात्म्यांना विचारले,

“आपल्या सर्वांची अशी दुर्गती का झाली?” त्यावर अनेकांनी त्यांनी पूर्वजन्मात केलेल्या पापांची माहिती दिली. त्यांची कहाणी ऐकून विप्रदास त्यांच्याबद्दल सहानुभूती वाटली. त्याने अधिक मासात गोकर्णी नदीत केलेल्या स्नानापैकी सात दिवसांच्या स्नानाचे पुण्य त्या प्रेतात्म्यांना दिले. तत्काळ चमत्कार घडला. त्या सर्व प्रेतात्म्यांना पूर्वीचे शरीर प्राप्त झाले. ते स्वर्गात गमन करते झाले. ” असे सांगून भगवान विष्णू थांबले. लक्ष्मीदेवी म्हणाली,

“हे संकर्षणा, पुरुषोत्तमा, आपण पुरुषोत्तम मासाची सर्वंकष महत्त्व खूप उत्कृष्टपणे सांगितले आहे. आपण सांगितलेला महिमा ऐकून भक्तगण मोठ्या भक्तिभावाने अधिक मासाचे व्रत, पूजा करतील हे नक्की!

 जय श्रीकृष्ण! जय भगवान विष्णू!!

अधिकमास महात्म्य समाप्त!

००००

© श्री नागेश शेवाळकर

पुणे

मोबा. ९४२३१३९०७१

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ अधिक मास : महात्म्य!… १ ☆ श्री नागेश शेवाळकर ☆

श्री नागेश शेवाळकर

? विविधा ?

अधिक मास : महात्म्य!… १ श्री नागेश शेवाळकर

‌आपल्या संस्कृतीची काही खास पवित्र अशी वैशिष्ट्ये आहेत. त्यापैकी एक म्हणजे दिवा, दीपक! घरातील देवघरात, मंदिरातील गाभाऱ्यात तेवणारा दिवा जसा मंगलमय, पवित्र असतो तसाच तो चैतन्यदायी असतो. प्रज्वलित दिवा एक मंगलमय वातावरण निर्माण करतो. दिवा जेव्हा अंधाराचे निर्मूलन करतो तेव्हाच तो तेजोमय प्रकाशाचे स्वागत करतो. दिवा लावल्याशिवाय जशी देवपूजा संपन्न होत नाही तसेच सायंकाळी लावलेला दिवा एक प्रकारचा आत्मविश्वास निर्माण करतो.

 दिवा दररोज सकाळी, सायंकाळी देवापुढे लावला जातो. षडरात्र, नवरात्र, दीपावली, नागदिवे/ देव दीपावली, पुरुषोत्तम मास आणि इतर अनेक सणांच्या निमित्ताने अहोरात्र नंदादीप तेवत ठेवण्याची आपली परंपरा आहे. अनेक घरांमध्ये सायंकाळी दिवा लावताना घरातील बालकांना देवापुढे बसवून प्रार्थना म्हटली जाते. या प्रार्थनेतून लहानपणापासून दिव्याचे महत्त्व बालकाच्या मनावर बिंबवले जाते. त्यातील काही ओळी…

‘दिव्या दिव्या दीपत्कार,

कानी कुंडल मोतीहार |

दिव्याला पाहून नमस्कार |

दिवा लावला देवापाशी,

उजेड पडला तुळशीपाशी|’

 ज्याप्रमाणे अनेक सणांमध्ये तबकात दीप घेऊन ओवाळण्याची परंपरा आहे, त्याचप्रमाणे अधिकमासात दिव्याचे अनन्यसाधारण महत्त्व आहे. दर तीन वर्षांनी येणाऱ्या पुरुषोत्तम मासामध्ये देवाजवळ नंदादीप लावण्याची परंपरा अनेक कुटुंबांमध्ये आहे. त्या संदर्भातील काही आख्यायिका ‘अधिकमास महात्म्य’ या अंतर्गत अनेक ठिकाणी वाचायला मिळतात…

अधिक मासाची कहानी

 एकदा भगवान‌ नारायण जनहितार्थ तपश्चर्येत ध्यानमग्न असताना तिथे महर्षी नारद यांचे आगमन झाले. “नारायण… नारायण… ” हा स्वर नारायणांच्या कानी पडला. नारद मुनींचे आगमन झाले हे समजताच भगवान विष्णूंनी डोळे उघडले. त्यांनी विचारले,

“नारदमुनी, यावे. बसा. ‌आपल्या येण्याचे प्रयोजन‌ सांगावे. सारे कुशल आहे ना?”

“होय, ‌नारायणा! सारे काही कुशल आहे. एक प्रश्न विचारायचा आहे.”

“नारदमुनी, तुम्हाला कधीपासून परवानगी घ्यावी लागते? काय मनात आहे ते नि:संकोच विचारावे. “

“नारायण… नारायण…! देवा, दरवर्षी बारा महिने असतात परंतु प्रत्येक तीन वर्षानंतर तेरावा महिना‌ येतो. त्यामागे काही विशिष्ट संकेत आहेत का?”

“मुनी श्रेष्ठ, आपण खूप छान प्रश्न विचारला आहे. जगात सत्कर्म वाढले की कल्याण होते. उलट जगामध्ये वाईट गोष्टींचे प्रमाण वाढले की मग अधोगती सुरू होते. सद्य युगात दुष्कर्मांची संख्या वाढल्यामुळे पाप वाढत चालले आहे. तुम्ही म्हणता त्या बारा महिन्यांनी तक्रार केली होती, की सध्या सर्वत्र वाढलेले पाप आम्ही आमच्या पोटात घेत असतो परंतु ते आम्हाला सहन होत नाही. आम्ही आमच्या पोटात जमा असलेल्या पापाचा तिसरा हिस्सा बाहेर काढून टाकत आहोत म्हणजे तितकाच पापाचा भार कमी होईल. त्याप्रमाणे त्या प्रत्येक महिन्याने तिसरा हिस्सा काढून‌ टाकला. काढून‌ टाकलेल्या पापाच्या हिश्श्यापासून नवीन मास उत्पन्न झाला अर्थात तेरावा महिना जन्माला आला. तो पापमय असल्याने त्याला मलमास किंवा‌ मलिनमास असे नाव मिळाले.

मलमासाला त्याच्या सोबतचे बारा महिने चिडवत होते, त्याची टिंगलटवाळी करत होते कारण कोणतेही शुभ कार्य करण्यासाठी मलमास अयोग्य समजला जात असे. सूर्याची गती मोजताना मलमास गृहित धरला जात नसे. त्यामुळे मलमास दुःखी होत असे. मलमासाने मानवरूप धारण केले. काय करावे म्हणजे हे बारा महिने आपला दुस्वास करणार नाहीत, मलाही इतर महिन्यांप्रमाणे योग्य स्थान, प्रतिष्ठा मिळेल. अशा विचारात असताना त्याला वैकुंठपती श्रीविष्णुचे स्मरण झाले. मलमास वैकुंठात गेला. आसवं गाळत तो श्रीविष्णुला शरण गेला. भगवान विष्णुंची त्याने आराधना केली. विष्णू म्हणाले,

“वैकुंठात केवळ सुख आणि सुख असताना तू दुःखी का आहेस? काय झाले?” तेव्हा अधिकमासाने स्वतःचे दुःख नम्रतेने श्री मधुसूदनाला सांगितले. ते ऐकून माधव म्हणाले,

“ठीक आहे. आपण आता गोलोकात जाऊया. तिथे मुरलीधर कान्हा आहे. सकल भक्तांचे दुःख तो तत्काळ हरण करतो. चल. “

भगवान विष्णुंच्या पाठोपाठ मलमास गोलोकात गेला. तिथे श्रीकृष्णांचे दर्शन घेतले. मलमासाचे आसवे थांबत नव्हती. ते पाहून श्रीकृष्णाने भगवान विष्णुला विचारले,

“महाविष्णू, हा मानव कोण आहे? हा सतत अश्रू का ढाळत आहे? याला कोणते दुःख आहे?” दामोदराचे प्रश्न ऐकून विष्णुंनी सारी परिस्थिती कृष्णाला कथन केली म्हणाले,

“हा पीडित मास माझ्याकडे आला. मी त्याचे सारे दुःख ऐकले. त्याचे दुःख केवळ तुम्हीच दूर करू शकाल म्हणून मी त्याला गोलोकात घेऊन आलो आहे. या दुःखिताचा तुम्ही उद्धार करावा, त्याच्या दुःखाचे हरण करावे. “

“महाविष्णू, हे चांगले केले. अगोदर तुम्हाला आणि नंतर मला शरण आलेल्या या मलमासाला मी माझे ‘पुरुषोत्तम’ हे नाव देतो. हा सर्व महिन्यांत श्रेष्ठ असेल. इतकेच नाहीतर माझे ऐश्वर्य ह्यास देतो. जसा मी सर्वत्र पवित्र, पूज्य आहे तसाच हाही पवित्र मानला जाईल. पुरुषोत्तम मासात भक्तगण जी धार्मिक कार्ये करतील त्याचे पुण्य फल त्यांना मिळेल. ” श्रीकृष्णाने मलमासाला जणू पुनर्जिवित केले, त्याला वरदान दिले. त्यामुळे आनंदित झालेला पुरुषोत्तम मास भगवान श्रीविष्णूंसह वैकुंठात परतला. त्याने तिथेच वास्तव्य केले…

००००

अधिकमास: दीप प्रज्वलन!

एकदा विष्णुपत्नी लक्ष्मीने पतीला विचारले, “श्रीहरी, मधुसूदना, मला हे जाणून घेण्याची इच्छा आहे की, अधिकमासात देवाजवळ दीप लावण्याचे किंवा लावलेल्या दिव्याचे रक्षण केल्याने कोणते फळ मिळते?”

विष्णू म्हणाले, “ऐक. अधिकमासात दीप लावण्याचा विधी आणि महत्त्व सांगतो…

अधिकमासाच्या प्रथम दिवशी सकाळी स्नानादि कार्ये आटोपून स्वच्छ केलेल्या, सजविलेल्या भूमीवर घट मांडावा. त्याच्यासमोर एक दीप ठेवावा, ज्यात सप्ततंतूंची वात घालून तूप किंवा तेल घालून यथाविधी पूजन करून दीप प्रज्वलित करावा. मनोभावे प्रार्थना करावी…

“हे परमेश्वरा, ही माझी दीपसेवा गोड मानून घ्यावी. ह्या दिव्यामुळे अंध:कार दूर होऊन कांतीही उजळून निघावी. ” याप्रमाणे पूजन केल्यामुळे गोदान, भूदानाचे पुण्य लाभते. दीप दान करणारास ज्याप्रमाणे सुकांती लाभते, त्याचप्रमाणे धनसंपदा लाभते, अखंड सौभाग्य मिळते. यासह विद्या प्राप्त होते, आयुरारोग्यासह समृद्धी मिळते, पुत्रपौत्र संतती लाभते, जो ब्राह्मण स्वतः दीप दान करतो त्याला ब्रम्हज्ञान प्राप्त होते, कुमारिकेस इच्छित पती मिळतो, सर्व दुःखांचे हरण होते, भीती दूर पळते, इतकेच नाही तर अधिकमासात जे कुणी दीप प्रज्वलनाच्या गोष्टी, महत्त्व सांगतात तेही पापमुक्त होतात… “

“श्रीहरी, अधिक मासातील दिव्याची अतिशय चांगली अशी माहिती सांगितली. ” लक्ष्मी समाधानाने म्हणाली.

००००

वेणीमाधव वात!

श्री लक्ष्मीने भगवान विष्णू यांना विचारले, “देवा, अधिक मासात ‘वेणीमाधव वातीचा’ दिवा लावतात. त्याबद्दल सांगावे. “

“महालक्ष्मी, हिंदू संस्कृतीमध्ये देवापुढे लावल्या जाणाऱ्या वातीला अनन्यसाधारण महत्त्व आहे. ज्या घरात सकाळ, संध्याकाळ पूजेच्या वेळी दिवा लावला जातो ते घर पवित्र होते. सहा दिवस, दहा दिवस नंदादीप लावण्याची प्रथा अनेक कुटुंबांमध्ये आहे. त्यामुळे अनेक संकटांचे निवारण होते, एकप्रकारचे चैतन्य निर्माण होते.

 दर तीन वर्षांनी येणाऱ्या ‘अधिक’ मासात देवापुढे वेणीमाधव ही वात प्रज्वलित करण्यात येते. वेणीमाधव वातीचा आकार इतर वातींच्या मानाने मोठा असतो. वेणीमाधव‌ वात लावण्यामागे अध्यात्मिक कारण आहे. वेणीमाधव वात ही नेहमी दिवा लावताना जी वात वापरल्या जाते तशी वात नसते. दररोज जी तुपाची फुलवात वापरण्यात येते त्या तेहतीस फुलवाती एकात एक माळून वेणीमाधव वात तयार होते. ती गुंफण एखाद्या वेणीसारखी दिसते म्हणून त्या वेणीस वेणीमाधव वात असे म्हणतात. हिंदू धर्मामध्ये तसेच अधिक मासामध्ये तेहतीस अंकाला धार्मिक महत्त्व आहे. तेहतीस हा अंक तेहतीस कोटी देवांचे अर्थात तेहतीस प्रकारच्या देवशक्तींचे प्रतिक मानल्या जातो. त्यामुळे तेहतीस फुलवातींची वात प्रज्वलित होताच मोठ्या प्रमाणावर ऊर्जेची निर्मिती होते. या ऊर्जेमुळे घरातील अपवित्रता, अघोरी शक्तींचे निर्मूलन होते, सकारात्मक वातावरण निर्माण होते अशी भक्तांची मान्यता आहे. भक्त असेही मानतात की, ही वात लावल्याने निर्माण झालेली पवित्रता पुढील तीन वर्षे म्हणजे पुढील अधिक मास येईपर्यंत टिकून राहते.

ही वात वेणीमाधव म्हणून ओळखली जाते त्यामागे असलेले कारण म्हणजे, सृष्टीचे निर्माते आणि पालनकर्ते ब्रह्मा, विष्णू, महेश या त्रिमूर्तीच्या शक्तीचे एकत्रीकरण म्हणजे वेणीमाधव वात होय!

वेणीमाधव वातीचे दुसरे महत्त्व असे की, यातील माधव म्हणजे श्री महाविष्णू! प्रयागराज येथे माधव अर्थात भगवान विष्णू, श्री महालक्ष्मीचे अर्थात आपले वास्तव्य आहे. श्री विष्णू यांना प्रयागराजचे व्दारपाल म्हणून ओळखले जाते, त्यांची पूजा केली जाते. तसेच प्रयागराज येथे गंगा, यमुना, सरस्वती या तीन नद्यांचा संगम आहे. त्यामुळे असे मानले जाते की, या सर्व गोष्टींमुळे वेणीमाधव ही वात आपल्या देवघरात लावल्याने मोठे पुण्य मिळते.

अधिकमासात किंवा धोंड्याच्या महिन्यात एकदा तरी वेणीमाधव वात देवघरात लावल्यामुळे लक्ष्मी प्रसन्न होते, सुख-समाधान-आनंद मिळतो. ज्याप्रकारे त्रिवेणी संगमावर स्नान केल्याने पुण्य मिळते तसेच पुण्य वेणीमाधव ज्योत देवघरात लावल्यामुळे प्राप्त होते.

“विष्णू देवा, खूप छान माहिती सांगितली आहे. आपण पाहतोय, वेणीमाधव वातीशिवाय भक्त इतरही वाती लावतात. “

“देवी, खरं आहे. तुमची निरीक्षण शक्ती चांगली आहे. मंजूळ वातही काही भक्त लावतात. हा ज्याच्या त्याच्या भक्तीचा प्रश्न आहे. वातीला वेगवेगळी नावे असली तरीही भक्तांचा भाव सारखाच असतो. “

“बरोबर आहे, देवा! खूप छान माहिती सांगितली. “

००००

मनीमाऊला मिळाली मुक्ती!

श्रीविष्णू लक्ष्मीला म्हणाले, “एक कथा सांगतो, सुशर्मा नावाचा एक ब्राह्मण होता. तो भिक्षा मागून उदरनिर्वाह करीत असे. एकदा पुरुषोत्तम मासाचा योग साधून त्याने षोडशोपचारे पुजा करून दीप प्रज्वलित केला. दररोज सकाळ- संध्याकाळ दिव्याची पूजा, भजन करणे हा त्याचा नेम होता. त्याच्या घरी असलेल्या उंदरांना पकडण्यासाठी एक मांजर दररोज येत असे. एके रात्री ती मांजर नेहमीप्रमाणे त्याच्या घरात आली असता ब्राह्मण नेहमीप्रमाणे नाम घेत दिव्यासमोर बसलेला होता. दिव्यावर काजळी चढली असल्याने दिव्याचा प्रकाश मंद झाला होता. तितक्यात तिथे उंदीर आल्याचे पाहून टपून बसलेली मांजर उंदराकडे झेप घेत असताना तिचा पाय दिव्याला लागला. त्यामुळे दिवा हलला. परंतु त्यामुळे ज्योतीवर आलेली काजळी गळून पडली. दिव्याचे तेज फाकले. सकाळ होताक्षणी मांजर गतप्राण झालेली आढळली. देवी, नकळतपणे दिवा प्रज्वलित केल्यामुळे मांजराला मुक्ती मिळून ते मांजर वैकुंठाला पोहोचले. दुसरीकडे मनोभावे दीपपूजन करणारा सुशर्मा नावाचा ब्राह्मण समृद्ध झाला, पुत्रपौत्र प्राप्त झाले. उत्तम आरोग्य, सुख मिळून त्यालाही मोक्ष प्राप्त झाला. “

“हे देवा, आपण खूप छान माहिती सांगितली आहे. त्यामुळे दिव्यासंदर्भात अजून काही ऐकण्याची लालसा उत्पन्न झाली आहे… “

००००

विमला नि सुशीला!

“लक्ष्मीदेवी, तुझी इच्छा जाणून एक कथा ऐकवतो…

अनेक वर्षांपूर्वी मथुरा नगरात शाकली नावाचा एक ब्राह्मण राहत होता. शुद्ध आचरण अशी त्याची ख्याती होती. त्याला विमला आणि सुशीला या नावाच्या दोन बायका होत्या. पुरुषोत्तम मासात एके दिवशी सुशीला पाणी आणण्यासाठी नदीवर गेली, तेव्हा तिला तिथे बरेच स्त्री पुरुष स्नान करताना दिसले. सुशीलेने घरी येऊन पतीला नदी स्नानाचे महत्त्व काय आहे ते विचारले. तेव्हा शाकलीने पत्नीला सांगितले, “श्री विष्णूला प्रिय अशा पुरुषोत्तम महिन्याची सुरुवात झाली आहे. या महिन्यात दीप प्रज्वलित केला असता मोठे पुण्य लाभते. ” ते ऐकून सुशीला म्हणाली,

“पतिदेवा, तुम्ही सांगितलेला या मासाचा महिमा ऐकून संपूर्ण महिना मी दीप लावू इच्छिते. “

पत्नीची इच्छा जाणून शाकलीने तिला परवानगी दिली. सुशीलेने मोठ्या आनंदाने, भक्तिभावाने पूजा करून दीप प्रज्वलित के

ला. नंतर पतीला नमस्कार करून त्यांना जेवायला देऊन स्वतः जेवण केले. आपल्या सवतीने केलेले कार्य विमलेस आवडले नाही. तिच्या मनात सवतीमत्सर जागा झाला. ती विचार करू लागली, काय करावे म्हणजे हिच्या पुजेत व्यत्यय येऊन तिची मनोकामना पूर्ण होणार नाही. विमलेच्या मनात एक कुविचार जागृत झाला. घरात कुणीही नाही हे पाहून विमलाने तेवत असलेला दीप शांत केला, त्यातले तेलही काढून टाकले. नंतर उतावीळपणे काय होते हे पाहण्यासाठी बसून राहिली. बाहेरून आलेल्या सुशीलेला शांत झालेला दिवा दिसताच तिला अतोनात दुःख झाले. तिने श्रीविष्णुला प्रार्थना केली. रोज तसाच प्रकार घडत होता.

विमला जाता येता कधी पदराने, कधी फुंकर घालून, कधी सारे तेल काढून दीप शांत करुन सुशीलाच्या भक्तीमध्ये विघ्ने निर्माण करीत होती. तो प्रकार सुशीलाच्या लक्षात आला परंतु ती शांत राहिली. कुणासही काहीही बोलली नाही. तिने पूर्ण पुरुषोत्तम मासात दीप प्रज्वलन करून व्रताची सांगता केली. त्याचे पुण्य तिला लाभले. दुसरीकडे विघ्नकर्ती विमलालाही तिच्या पापाचे फळ मिळाले. तिची तीन मुले मृत झाली. तिला स्वतःला दोन्ही डोळ्यांनी अंधत्व आले. काही काळानंतर तिलाही मरण प्राप्त झाले… “

“देवी, लक्ष्मी असे आहे, दीप लावण्याचे महत्त्व!”

“स्वामी, केवळ पुरुषोत्तम मासातच नाही तर दररोज मनोभावे दिवा लावणाऱ्या कुटुंबांवर आपला असाच आशीर्वाद असू द्या. “

“तथास्तु!” श्रीविष्णू म्हणाले.

क्रमशः…

© श्री नागेश शेवाळकर

पुणे

मोबा. ९४२३१३९०७१

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ मला समजलेली संत तुकारामांची अभंग गाथा… भाग – २३ ☆ अरुणा मुल्हेरकर ☆

अरुणा मुल्हेरकर

? विविधा ?

☆ मला समजलेली संत तुकारामांची अभंग गाथा… भाग – २३ ☆ अरुणा मुल्हेरकर ☆

समाज स्थितीचे वर्णन

गाथेतील अभंग वाचत असता संत तुकारामांच्या काळी समाजस्थिती कशा प्रकारची होती याचाही आपल्याला काही अभंगांतून अंदाज येतो. आजच्या लेखात याच संदर्भातील काही अभंगांचा अभ्यास करावा असे मला वाटते.

समाजात फार अंदाधुंदी माजली होती. न्याय राहिला नव्हता. श्रेष्ठ मानला, जाणारा ब्राह्मण वर्ग त्यांचा नीती धर्म विसरला होता. अशा परिस्थितीचे वर्णन करणारा हा गाथेतील अभंग पहा—

हाती होन दावीती वेणा /

करिती लेकीची धारणा//

ऐसे धर्म जाले कली/

पुण्य रंक पाप बळी//

सोडिले आचार/

द्विजृाचहाड जाले चोर//

टिळे लपविती पातडी /

लेती विजार कातडी//

बैसोनिया तक्ता/

अन्योविण पीडिती लोका//

मुदबरव लिहिणे/

तेल तूप साबण केणे //

नीच्याचे चाकर/

चुकलिया खाती मार//

राजा प्रजा पिडी/

क्षेत्री दुश्चितासी तोडी//

वैश्य शुद्रादिक/

हे तो सहज नीच लोक//

* वघे बाह्यरंग/*

आत हिरवे वरी सोंग//

तुका म्हणे देवा/

काय निद्रा केली धावा//

समाजाची ही अशी अत्यंत हीनदीन अवस्था पाहून तुकाराम महाराज खेद व्यक्त करत आहेत आणि देवाला निद्रा सोडून धाव घेण्याचे साकडे घालत आहेत.

ते देवाला सांगतात, ” लग्नात लोक त्यांच्या कन्येचे पैसे(होन) घेतात आणि तिला सासरी पाठवतात. याचाच अर्थ चक्क तिचा विक्रय करतात. ज्याच्याकडून जास्त पैसे मिळतील त्याच्या गळ्यात ती सौभाग्यकांक्षिणी वरमाला घालणार. अत्यंत शोचनीय अशी बाब आहे ही. हा कलियुगात माजलेला अधर्म आहे. याने पुण्याचा क्षय होऊन पाप वाढत चालले आहे. ब्राह्मण आपला धर्म, सदाचार सोडून चहाड्याचोऱ्या करू लागले आहेत. कुंकवाचा टिळा लावणे, पंचांग बघणे सोडून देऊन यवनांप्रमाणे वेश धारण करणे त्यांनी सुरू केले आहे. न्यायाधीश न्यायाच्या आसनावर बसून न्याय असणाऱ्यांनाच शिक्षा ठोठवून पीडित करीत आहेत. पाकशाळेत (मुदबख) लागणाऱ्या बारीक सारीक वस्तूंचा जमाखर्च लिहिण्यात वेळ दवडत आहेत. ते नीच माणसांचे चाकर होऊन कामात झालेल्या क्षुल्लक चुकीसाठी मार खात आहेत. ज्या प्रजेचे पालन करायचे ती प्रजा आधीच दुःखी असताना क्षत्रिय राजे तिला लुटतात आणि पीडा देतात. वैश्य व शूद्रादिक लोक तर स्वभावतःच हलक्या मनोवृत्तीने वागत आहेत, त्यांच्याबद्दल काय सांगावे? अशा प्रकारे लोकांत बाह्य देखावा, अनाचार व ढोंगीपणा पसरला आहे. अंतरंगात मत्सर आणि वरून सोज्वळतेचे

सोंग या माणसांत भरले आहे. या दुष्टांना दंड देण्यासाठी अहो देवा तुम्ही या असा महाराज धावा करीत आहेत. ”

तुकाराम महाराजांना ब्राह्मणांकडून अशा प्रकारचा त्रास भोगावा लागला आहे. समाजातील त्यावेळच्या चातुर्वर्णी पद्धतीचा अर्थ विशेषतः या ब्राह्मण वर्गाने चुकीचा लावल्यामुळे, स्वतःला विद्वान समजून ते समाजातील दुबळ्या माणसांना अत्यंत हीन लेखत आणि त्यांचे जगणे असह्य करीत. यासाठीच अशा प्रकारचे अभंग रचून समाजात जागृती निर्माण करण्याचा तुकाराम महाराजांचा प्रयत्न असावा. या वर्ण व्यवस्थेसंबंधी असलेल्या हा अभंग पहा—

वेद विहित तुम्ही आई का हो कर्मे /

बोलतो ती वर्मे संतांपुढे//

चारी वर्ण जाले एकाचिये अंगी/

पाप-पुण्यभागी विभागीले//

प्रथम पाऊली पावविला पंथ/

आदी मध्य अंत भेद नाही//

आंबे बोरी वड बाभुळ चंदन/

गुणागुणभिन्न अग्नि एक//

तुका म्हणे मन उन्मन जो होय/

तोवरी हे सोय विधी पाळी//

तुकाराम महाराज म्हणतात, ” अहो लोकहो,

वेद प्रणित अवस्था काय आहे, ते तुम्ही ऐका. मी तुम्हा संतांपुढे ती सांगतो. एकाच देवापासून ब्राह्मणादी चार वर्ण निर्माण झाले आहेत. सर्व एकाच देवाची लेकरे आहेत. ते आपापल्या विहित कर्माने व पाप-पुण्याच्या भागाने वाटले गेले. सर्वांच्या उत्पत्तीचे स्थान जो हरी त्याच्या ठिकाणी प्रारंभ, मध्य, आणि अंत नाही. आंबे, बोरी, वड, चंदन यांचा दृष्टांत देऊन महाराज सांगतात या वृक्षातील गुणांचे व दोषांचे अनेक भेद आहेत. पण जळल्यानंतर ते एकच होतात. सर्वांची एक राखच होते. मूळ हरीच्या ठिकाणीही आदि अंत, कर्ता कर्म फळ इत्यादी भेद नसतो. जोपर्यंत मनाची उन्मनी अवस्था होत नाही तोपर्यंत मनुष्याने वेदाने सांगितलेल्या विधी मार्गा ने चालले पाहिजे. थोडक्यात, ब्राह्मण श्रेष्ठ आणि शूद्र नीच ही भावना मनातून त्यागिली पाहिजे.

त्या काळात सिंहस्थ- पर्वणी असा एक काळ मानला जात होता. आजही पंचांगात आपल्याला सिंहस्थ काळ हा शब्द सापडतो. या काळात लग्न, मुंज अशी मंगल कार्ये होत नाहीत असे म्हणतात. आता बदलत्या काळानुसार सर्व लोक ही परंपरा पाळतातच असे नाही. या समस्त काळात त्यावेळी ब्राह्मण डोक्यावरचे व दाढीचे केस काढायचे. त्यावरून महाराजांनी हा अभंग रचला आहे. ते म्हणतात—-

आली सिंहस्थ पर्वणी/

न्हाव्या भटा झाली धणी //

अंतरी पापाच्या कोडी/

वरी वरी बोडी डोई दाढी//

बोडीले ते निघाले/

काय पालटले सांग वहिले//

पाप गेल्याची काय खूण/

नाही पालटले अवगुण//

भक्तीभावेवीण /

तुका म्हणे अवघा सीण //

सिंहस्थ पर्वणी आली म्हणजे क्षेत्रात जे भट व न्हावी असतात त्यांची चंगळ होते. अंतःकरणात कोट्यावधी पापे आहेत, आणि दाढी काढली व डोक्याचे मुंडन केले तर त्याचा काय उपयोग? नुसते केस निघाले, पण अंगातील अवगुण निघाले का? त्याची काय खूण आहे? तुकारामांना एवढेच सांगायचे आहे की, पांडुरंगाची श्रद्धेने भक्ती करण्या वाचून बाकीचे सर्व व्यवहार पिडादायीच आहेत.

चातुर्वर्ण व्यवस्था हीच त्यावेळची मुख्य समाज व्यवस्था होती. या व्यवस्थेतील लोकांच्या कर्मा विषयी आणि प्रारब्धाविषयी महाराज वेळोवेळी सांगतात.

पहा हो देवा कैसे जन/

भिन्नभिन्न संचिते //

एक नाही एका ऐसे/

दावी कैसे शुद्ध हीन//

पंचभूते एकी राशी/

सूत्रे कैसी ओळखावी//

तुका म्हणे जो जे जाती/

त्याची स्थिती तैशी ते//

देवा, हे लोक किती निरनिराळ्या प्रारब्धाचे आहेत. एका सारखा एक नाही. प्रारब्धाच्या योगाने काही चांगले आणि काही हीन अशी विविधता दिसते. सर्व सृष्टी पंचमहाभूतांच्या एकाच मूळ पदार्थाने बनली आहे, असे असताना नशिबाची भिन्नता कशी ओळखावी? जो जन्माप्रमाणे, कर्माप्रमाणे ज्या जातीचा असेल तशीच त्याची स्थिती असते. थोडक्यात ब्राह्मणांनी विद्याभ्यास करावा, वेदपठण करावे, क्षत्रियांनी देशाचे सीमा रक्षण करावे, वैश्यांनी व्यापार करावा आणि शूद्रांनी गावाची साफसफाई करावी. समाजाची घडी उत्तम रीतीने बसण्यासाठी ही व्यवस्था होती, परंतु ब्राह्मण वर्गांनी त्याचे स्वरूप उच्च~नीच अशा प्रकारचे केले.

पुढील लेखात आणखी काही अभंगांचा आपण परामर्श घेऊ.

क्रमशः… २३ 

© अरुणा मुल्हेरकर 

डेट्राॅईट (मिशिगन) यू.एस्.ए.

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ तो आणि मी…! – भाग १०४ ☆ श्री अरविंद लिमये ☆

श्री अरविंद लिमये

? विविधा ?

☆ तो आणि मी…! – भाग १०४ ☆ श्री अरविंद लिमये ☆

(पूर्वसूत्र- “बाबा तुम्ही सहन करू शकणार नाही अशी एक गोष्ट आहे. आता रात्र बरीच झालीय.. पण हे तुम्हाला आत्ताच सांगणं गरजेचं आहे. तुम्ही त्रास करून घेणार नसाल तरच सांगतो. ” सलिल म्हणाला.

“नाही त्रास करून घेणार. तू सांग.. काय झालंय?”

त्याने जे कांही सांगितलं ते ऐकून मी सून्न झालो. अक्षरशः गोठून गेल्यासारखा क्षणभर बसून राहिलो. तो म्हणाला होता तसं पैशाने ज्याची भरपाई होऊच शकणार नाही असं बरंच कांही मी गमावून बसलो होतो!!)

महापुरामुळे घरी झालेल्या संपूर्ण विध्वंसाचं शक्य तितक्या मोजक्या शब्दात वर्णन करून तो म्हणाला होता,.. “बाबा आपल्या बंगल्यात ८. ५० फूट उंचीपर्यंत पाणी आलेलं होतं. घरात आता फक्त ओल मुरलेल्या भिंती आणि दिवसभर राबून घरातला सगळा चिखल उचलून बाहेर बागेत रचल्या नंतरचे चिखलमाखलेले फ्लोअर अशी अवस्था आहे. ते सगळं पुन्हा मिळवता येईल बाबा पण तुमचं लेखन… ” तो बोलायचा थांबला. त्याने न सांगताही मला अंदाज आला होता… “लाॅफ्टवर ठेवलेल्या माझ्या बॅगा ना.. ?”मी शांतपणे विचारलं.

“हो. त्या तुमच्या सर्व बॅगांमधे तुम्ही जपून ठेवलेलं पूर्वीपासूनचं तुमचं सगळं लेखन भिजून, कुजून लगदा झाल्याने टाकून द्यावं लागलंय बाबा… “

ऐकून मी सून्न झालो. त्या सर्व बॅगांपैकी कुठल्या बॅगेत काय आहे हे मला फक्त माहित होतं असं नाही तर ते तोंडपाठ होतं. माझ्या आजवरच्या सर्व कथांची मासिके, माझी नाटके, एकांकिका, बालनाट्ये यांची हस्तलिखिते, सेन्साॅर सर्टिफिकेटस्, मला मिळालेले सगळे लेखन-पुरस्कार, ‘प्राजक्त’ या मासिक पत्रिकेत दरवर्षी वेगवेगळे विषय घेऊन गेली अकरा वर्षे मी लिहित असलेल्या सदरलेखनाच्या छापील प्रतींचे गठ्ठे ज्यात ‘प्राजक्त’चे तोवरच्या माझ्या लेखांच्या एकूण १३२ छापील प्रतींचे अंक होते… आणि असंच बरंच कांही! सगळं एका रात्रीत स्वाहा झालं होतं!त्या सदरलेखांमधील जवळजवळ सर्वच आशयांवरून एकेक कथा, एकांकिका, किंवा एखादं दोन अंकी नाटकही.. अशा अनेक नव्या साहित्यकृतींना आकार देण्याचा माझा मनोदय होता. त्याचं नियोजन सुरू होतं आणि अचानक माझं सगळं अक्षरधनच पाण्याच्या प्रचंड प्रवाहाने लुटून नेलं होतं!!

माझ्या खरंच ते जिव्हारीच लागलं. त्या रात्री अंथरुणाला पाठ टेकली. आणि त्या अस्वस्थ मनःस्थितीत या विध्वंसात देवघरातील ती दत्ताची मूर्ती? ती.. तीही.. अशीच.. ? या विचाराचाच फटका बसावा तसा मी ताडकन् उठून बसलो. बाकी सर्वजण झोपले होते. सलिल/अनघा दोघांचं उद्याच्या घरस्वच्छतेच्या कामांच्या नियोजनाबद्दलचं बोलणं अस्पष्टसं कानावर आलं न् मी त्या दिशेला धाव घेतली. , !ती.. ती.. दत्तमूर्ती न् इतर सगळे देवही चिखलात वहात जाऊन रुतले गेले असतील तर? तेही चुकून त्या कचऱ्याच्या ढीगात टाकले गेले नसतील ना? नुसत्या कल्पनेनेच मी धास्तावलो.

“बाबा.. तुम्ही झोपला नाहीत अजून? असे घाबरलायत कां? काय झालंय?” मला पहाताच सलिलने विचारलं.

” मला सांग.. आपल्या देवघरातल्या देवांचं काय? ते पण वाहून गेलेत कां? ते.. ते.. चिखलाबरोबर त्या कचऱ्याच्या ढीगात तर टाकले गेले नसतील ना रे?” मी काकुळतीने विचारलं.

सलिलने अनघाकडे पाहिलं

“नाही बाबा… अहो, दिवसभराच्या गडबडीत तुम्हाला सांगायचं राहूनच गेलं. बाबा.. एक आश्चर्य वाटेल अशी आनंदाची बातमी आहे. “

इतक्या सगळ्या विध्वंसातही आनंदाची बातमी?… मला कांही समजेचना.

“बाबा, घरातला निम्मा शिम्मा चिखल बाहेर बागेत टाकून झालाय. राहिलेला उद्या दिवसभरात टाकून होईल. पण आश्चर्य म्हणजे आपण देव मांडतो ते ते छोटं देवघर तिथंच तिरकं होऊन चिखलात रुतून राहिल्याने त्यातले देव आणि ती दत्तमूर्तीही त्यावरच विखुरलेले दिसले. मी ते देवघर आणि ती मूर्ती स्वच्छ धुवून तिथे घरच्या किचन कट्ट्यावर ठेवलीय बाबा… ” हे ऐकताच माझ्या अंगावर शहाराच आला एकदम.. ! माझं सगळं अक्षरधन वाहून गेलं तरी ‘तो’ आहे! मग आणखी काय हवं? मनाला झालेल्या त्या अनपेक्षित आनंदाने मी भारावून गेलो होतो. सगळं ‘त्या’च्यावर सोपवून होईल ते पहात रहायचं असं मनोमन ठरवलं आणि निश्चिंत झालो.. !!

अंथरुणाला पाठ टेकली तेव्हा मध्यरात्र उलटून गेली होती. त्या निश्चिंत मनात आपल्याला या प्राप्त परिस्थितीत काय करता येईल याचे विचार सुरु झाले आणि झोप निघूनच गेली. मी झरकन् उठून शेजारच्या टीपाॅयवर ठेवलेला माझा मोबाईल उचलला. आजवर माझी नाटके आणि एकांकिका स्पर्धेत सादर केलेल्या मुंबई, पुणे, अहमदनगर, डोंबिवली, नाशिक, अमरावती, नागपूर, इंदौर अशा विविध ठिकाणच्या सर्व संस्थांची व्हाॅटस् अॅप काॅन्टॅक्स उपलब्ध होती. मी लगेचच सर्वांना सविस्तर मॅसेज पाठवून पुरामुळे निर्माण झालेल्या गंभीर परिस्थितीची कल्पना दिली आणि त्यांनी सादर केलेल्या माझ्या नाटक/एकांकिका यांच्या संहिता त्यांच्याकडे उपलब्ध असतील तर त्याची एक प्रत प्लीज मला पाठवावी अशी विनंती केली. मी यापेक्षा जास्त कांहीच करू शकत नव्हतो.

माझ्या या नाट्यसंहितांपेक्षाही माझ्यासाठी कणभर जास्तच महत्वाचं होते ते ‘प्राजक्त’ मधल्या जाने. २०१० ते जुलै २०१९ या जवळजवळ साडेनऊ वर्षातल्या माझ्या सदर लेखनाचे १३२ अंक पुन्हा मिळवणे. पण तो प्रश्न अजून अधांतरीच होता.

दुसऱ्या दिवशी सकाळी मी ‘प्राजक्त’ च्या ऑफिसमधे फोन करून विचारणा केली. पुरापूर्वी कांही दिवस आधीच साफसफाई करताना कपाटांमधे जागा करण्यासाठी तिथे साठलेले सगळे जुने अंक त्यांनी रद्दीत विकून टाकले होते!

अखेर एक शेवटचा उपाय म्हणून त्या महिन्याच्या सदरासाठी लिहिलेल्या लेखाबरोबर मी एक जाहीर निवेदन पुढच्या अंकात प्रसिद्ध करण्यासाठी लिहून दिलं. त्यात माझी नेमकी अडचण विशद करून प्राजक्तचे सुरूवातीपासूनचे अंक कुणाकडे उपलब्ध असतील तर मला कळवावे असं वाचकांना आवाहन केलं आणि मी त्याच्या झेरॉक्स कॉपीज् स्वखर्चाने काढून घेईन हेही लिहिलं. या सगळ्या सदरलेखनाला आजपर्यंत कितीतरी वाचकांनी कौतुक करणाऱ्या प्रतिक्रिया वेळोवेळी आवर्जून पाठवल्या होत्या. त्यांच्यापैकी अगदी एकाने जरी ते अंक जपून ठेवले असतील तर त्या अंकांची मला गरज आहे हे निवेदन दिल्याशिवाय त्याच्यापर्यंत पोचणार कसं? हाच विचार ते निवेदन दिलं तेव्हा माझ्या मनात आलं. आणि ध्यानीमनी नसताना खरंच चमत्कार घडला! जादूची कांडी फिरावी तशी सगळी सूत्रं वेगाने हलत गेली आणि… !

दुसऱ्याच दिवशी सर्व नाट्यसंस्थांकडून मी पाठवलेल्या मेसेजेस् ना सकारात्मक उत्तरे आली आणि पुढे दोन-तीन दिवसात त्यापैकी काहींनी पीडीएफ् रुपात तर बाकीच्यांनी त्या संहितेची झेराॅक्स काॅपी मला पाठवून माझ्या हरवलेल्या अक्षरधनाची कांही प्रमाणात कां होईना भरपाई केली. हा एक सुखद धक्काच होता माझ्यासाठी! नंतर मधे आठदहा दिवसही उलटले नसतील आणि अचानक एक फोन आला.

“आपण अरविंद लिमये बोलताय ना?” आवाज अपरिचित. कांहीसा थकलेला. माधवनगरचे कुणी सुधाकर फाटक आजोबा बोलत होते.

“मी प्राजक्तमधलं तुमचं निवेदन वाचलं. त्यातले तुमचे लेख मला आवडतात. त्यामुळेच मी सभासद झाल्यापासूनचे म्हणजे साधारण २०१५पासूनचे सगळे अंक क्रमवार अॅरेंज करून ते जपून ठेवलेत. पण अट एकच. तुम्ही स्वतः येऊन ते घेऊन जायचे. त्यामुळे निदान आपली भेट तरी होईल. आणि हो.. त्याच्या झेराॅक्स काढायची तसदी नका घेऊ. आज माझे वय आहे ८५. मी प्राणपणाने जपलेले ते अंक योग्य माणसाच्या हाती गेल्याचं समाधान मला मिळतंय याचा मला आनंदच आहे… !” ते बोलत होते. मी थक्क होऊन ऐकत होतो. हे एवढंच नव्हतं. दुसऱ्याच दिवशी ‘प्राजक्त’चं मुद्रण कोल्हापूरला ज्या प्रेसमधे होत असे त्या प्रेसचे श्री. डबीर यांचाही निरोप आला. त्यांच्याकडून २०१० च्या आधीचेही सगळे अंक सेव्ह असल्याने त्यांनी ते पेनड्राईवमधे डाऊनलोड करून देण्याचे आश्वासन दिले.. !

जे मला कधीच परत मिळू शकणार नाही असं मला वाटलं होतं ते माझं सगळं अक्षरशः मला अचानक परत मिळणं हा चमत्कारच होता माझ्यासाठी !!

हे सगळं इतकं अनपेक्षित, इतकं सहज, आणि इतकं अल्पावधीत घडलं की हे एखादं सुखद स्वप्नच आहे असंच वाटत राहिलं! प्रतिकूल परिस्थितीत हे असं हवं ते हवं तसं मला बहाल करण्याची ‘त्या’ची किमया म्हणजे अंधारून आलेल्या मनात भरून राहिलेला मिट्ट काळोख क्षणार्धात उजळून टाकणाऱ्या लख्ख प्रकाशासारखी ‘त्या’च्या अलौकिक स्पर्शाची अनुभूती वाटली मला!

नुकतेच घडून गेल्यासारखे मला इतक्या वर्षांनंतरही स्वच्छ आठवणाऱ्या स्वेच्छानिवृत्ती नंतरच्या काळातले हे दोन प्रातिनिधिक प्रसंग.. ! खरंतर तो आणि मी या विषयाशी संबंधित मनात घर करून राहिलेल्या अशा असंख्य आठवणींचा या प्रदीर्घ अशा सदरलेखनाच्या निमित्ताने मी घेतलेला वेध म्हणजे एकापरीने ‘त्या’चा स्पर्श जाणवलेल्या आजवरच्या आठवणीत साठलेल्या अनेक अनुभवांकडे माझे मागे वळून पहाणेच होते! यातून माझ्या नकळत्या वयापासून मी मनात जपलेला ‘तो’ आज वानप्रस्थात प्रवेश केलेल्या माझ्या आयुष्याच्या उतरत्या वळणावर उभ्या मला कसा दिसतो ते आता या सदराच्या पुढच्या समारोपाच्या भागात.. !

क्रमश:…  (प्रत्येक गुरूवारी)

©️ अरविंद लिमये

सांगली (९८२३७३८२८८)

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ “उंबरठा…” ☆ अर्चना देशपांडे ☆

अर्चना सुरेश देशपांडे

? विविधा ?

☆ “उंबरठा…” ☆ अर्चना सुरेश देशपांडे

उंबरठा म्हटले की आपल्या डोळ्यासमोर येतो घराच्या मुख्य दाराच्या चौकटीला खालच्या बाजूला लावलेलं जाड उंच लाकूड. उंबरठ्याशिवाय घराला पूर्तता नसते, हा घराचा महत्वाचा भाग असतो.

माझ्या माहेरी घर मोठे होते. प्रत्येक खोलीला उंबरठा होता. पूर्वी अंगणात रांगोळी काढताना उंबरा धुऊन त्यावरही हळदी कुंकू घालून नमस्कार केला जायचा. उंबऱ्यावर गो पद्म, स्वस्तिक रांगोळी काढली जायची.

पूर्वीच्या काळी घर हेच स्त्रीचे विश्व होते. बाईने उंबरठा ओलांडून स्वकर्तुत्वाने काही करायचे म्हटले की तिला घरातून विरोध असायचा.

उंबरठा म्हणजे तिच्यासाठी लक्ष्मणरेषा. स्त्रिने घरातील लोकांच्या विरुद्ध उंबरठा ओलांडून बाहेर जाणे म्हणजे संस्काराची मर्यादा ओलांडली असे मानले जात असे.

नववधू घरात प्रवेश करताना उंबरठ्यावर ठेवलेले तांदळाचे माप ओलांडून मगच घरात प्रवेश करते. तिच्या दृष्टीने हा गृहप्रवेश खूप महत्त्वाच्या ठरतो.

धार्मिक दृष्टीने सुद्धा उंबरठा महत्त्वाचा मानला जातो. नरसिंह व लक्ष्मीचे स्थान त्या ठिकाणी असते. उंबरठा सहसा उंबराच्या झाडाच्या लाकडापासून बनवला जातो.

उंबरठा हा मर्यादेची जाणीव करून देतो. उंबरठ्याच्या आत सुरक्षतेची भावना असते. आपल्या संस्कृतीत उंबरठा म्हणजे संरक्षण, मर्यादा आणि सकारात्मक ऊर्जेचे प्रतीक मानले जाते. तर वास्तुशास्त्रानुसार उंबरठा नकारात्मक ऊर्जा रोखून धरतो.

हल्ली फ्लॅट संस्कृतीमध्ये लाकडी उंबरठा ही कल्पनाच इतिहास जमा झाली आहे. तिथे उंबरे नसतातच, अगदी असेल तर  कडापयाची लांबडी पट्टी बसवून घेतात.

माझ्या मते घराला उंबरा असावा. उंबरा पायाला क्षणभर थांबवतो आणि पाय थांबले की मन ही क्षणभर जागे होते. तो सांगतो जणू आता घरात प्रवेश करतो आहेस, बाहेरचा राग, अहंकार, कटुता दाराबाहेर ठेव आणि घरात प्रवेश करताना प्रेम, आदर, संयम व विनम्रता घेऊन ये.

उंबरठा आपल्याला मर्यादा शिकवतो. बाहेर किती ही मोठ्या पदावर असलास तरी घरी येताना माणूस म्हणून घरात प्रवेश कर.

सद्गुरु वामनराव पै सांगतात “माणसाने कुठे थांबायचे हे माणसाला कळायला हवे” खरं पाहता उंबरा हेच शिकवतो. पती, पत्नी, आईवडील आणि मुले, सासू-सून, बहीण -भाऊ, आजी आजोबा व नातवंडे या प्रत्येक नात्यात उंबरा म्हणजे मर्यादा असतात. हा उंबरा ओलांडला गेला तर नाती बिघडतात आणि हा उंबरा जपला तर आपुलकी राहते, घरात शांतता नांदते.

थोडक्यात दाराचा उंबरा घराचे रक्षण करतो तर मनाचा उंबरा नात्याचे बंध जोडून ठेवतो.

 

© अर्चना सुरेश देशपांडे

पुणे

मो. ९९६०२१९८३६

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ “चुकेल तो शिकेल” ☆ श्री जगदीश काबरे ☆

श्री जगदीश काबरे

☆ “चुकेल तो शिकेल☆ श्री जगदीश काबरे ☆

एखाद्या व्यक्तीला “मी कधीच चुकत नाही” किंवा “माझी विचारसरणीच अंतिम सत्य आहे” अशी ठाम खात्री वाटू लागते, तेव्हा ती केवळ त्याच्या मतांवर ठाम असते असे नसून, तिच्या संपूर्ण मानसिक रचनेत एक प्रकारचा बंदिस्तपणा निर्माण झालेला असतो. मनोवैज्ञानिक दृष्टिकोनातून ही अवस्था ‘cognitive rigidity’ म्हणजेच विचारांतील कठोरता दर्शवते. अशा व्यक्तीला नवीन माहिती, विरोधी मत किंवा आत्मपरीक्षण स्वीकारणे कठीण जाते, कारण त्यातून तिच्या ‘स्व’बद्दलच्या प्रतिमेला धक्का बसण्याची भीती असते. परिणामी, ती व्यक्ती एकाच विचाराच्या चौकटीत अडकून राहते आणि चकवा लागल्यासारखे त्याच प्रश्नाभोवती वारंवार फिरत राहते. हे वर्तन बाहेरून हट्टीपणासारखे दिसते, पण आतून ते असुरक्षिततेशी जोडलेले असते.

या प्रक्रियेमागे ‘confirmation bias’ ही एक महत्त्वाची मानसिक प्रवृत्ती कार्यरत असते. म्हणजे, माणूस आपले आधीचे मत बरोबर ठरवणारीच माहिती स्वीकारतो आणि विरोधी माहिती नाकारतो किंवा दुर्लक्ष करतो. त्यामुळे “मीच बरोबर आहे” ही भावना अधिकाधिक दृढ होत जाते. यात अहंकाराची जोड, व्यक्तीचे मत आणि तिची ओळख हे सगळे गुणावगुण एकरूप होतात. त्यामुळे मत चुकले आहे हे मान्य करणे म्हणजे स्वतःलाच कमी लेखणे, अशी भीती निर्माण होते. यामुळे व्यक्ती वस्तुनिष्ठ विचार करण्याऐवजी आत्ममग्नतेत गुरफटते.

एखाद्या रुग्णाने “मला काहीच आजार झालेला नाही” असे ठरवले, तर तो निदान, तपासणी आणि उपचार या सगळ्यांपासून दूर राहतो. परिणामी आजार अधिक बळावतो. त्याचप्रमाणे, विचारांच्या पातळीवरही “मी चुकूच शकत नाही” ही धारणा व्यक्तीला आत्मसुधारणेपासून रोखते. ती स्वतःच्या विचारांकडे नव्या दृष्टीने पाहत नाही, त्यामुळे चुका सुधारण्याची संधीच नाकारली जाते. असे वास्तव नाकारणे, हा एक प्रकारचा मानसिक बचावात्मक प्रतिसाद असतो. याउलट, विवेकशीलता म्हणजे स्वतःच्या विचारांवरही प्रश्न विचारण्याची तयारी ठेवणे ही बौद्धिक नम्रता प्रगतीसाठी अत्यावश्यक असते. माणूस चुकतो आणि आपणही चुकू शकतो, हे मान्य केल्यावरच तो नवीन शिकण्यास, बदल स्वीकारण्यास आणि अधिक व्यापक दृष्टिकोन विकसित करण्यास तयार होतो. डोळ्यावरचा धुरकट चष्मा पुसण्याची तयारी असणे हीच खरी प्रगतीची सुरुवात असते.

अशा पार्श्वभूमीवर, “मीच बरोबर” या आत्ममग्नतेत अडकलेली व्यक्ती केवळ स्वतःच्या बौद्धिक विकासालाच अडथळा ठरत नाही, तर व्यापक सामाजिक संवादालाही बाधा आणते. कारण संवादाचा गाभा हा परस्परांचे ऐकण्याची तयारी, स्वतःच्या भूमिकेवर पुनर्विचार करण्याची क्षमता आणि सत्याच्या शोधात लवचिक राहण्याच्या वृत्तीमध्ये असतो. जेव्हा एखादी व्यक्ती आपल्या मतांना अंतिम सत्य समजते, तेव्हा ती प्रत्यक्षात सत्याच्या शोधापासून दूर जात असते आणि स्वतःच्या विचारांच्या प्रतिध्वनीतच अडकून पडते. खरी विवेकशीलता ही अचूकतेच्या दाव्यात नसून, चुकण्याची शक्यता मान्य करण्याच्या प्रामाणिकपणात आणि त्या चुकांमधून स्वतःला सतत सुधारण्याच्या धडपडीत असते. म्हणूनच बौद्धिक प्रगतीचा मार्ग हा आत्ममग्नतेतून नव्हे, तर शंकांना सामोरे जाण्याच्या धैर्य आणि आत्मपरीक्षणाच्या सवयीमधूनच उलगडत जातो, हे आपण जेवढ्या लवकर लक्षात घेऊ तेवढे बरे. 

© श्री जगदीश काबरे

(लेखक विज्ञान आणि वैज्ञानिक दृष्टीकोन प्रसारक आहेत.)

jetjagdish@gmail. com

मो ९९२०१९७६८०

≈ संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ मी आणि AI -☆ विभावरी कुलकर्णी ☆

विभावरी कुलकर्णी

🔅 विविधा 🔅

मी आणि AI – ☆ विभावरी कुलकर्णी

माझे आत्ता पर्यंत जे व्यक्ती विशेष (थोडक्यात म्हणजे बावळटपणा किंवा मूर्खपणा) मी लिहिले आणि आपण वाचले त्यात अजून एक भर पडली. खूप दिवस AI नामक सर्वज्ञात असलेल्या जीन विषयी ऐकत होते. फारसा विश्वास नव्हताच! पण म्हंटले बरेच लोक प्रशंसा करत आहेत, तर बघावे हा जीन काय काय करतो? कारण नवीन नवीन शिकणे, विविध प्रयोग करणे हे जणू रक्तातच आहे.

आज एका वस्तूवर अडले. इमेज तर दिसली आणि उत्सुकता वाढली. म्हणून सर्वज्ञ AI कडे धाव घेतली, तर त्या वस्तुच्या फोटोत आणि याच्या उत्तरात काहीच साम्य नाही. शेवटी त्या विषयी योग्य माहिती घरातूनच मिळाली. म्हणजे आपण पूर्वेचा रस्ता विचारावा आणि AI ने आकर्षक पद्धतीने उत्तरेला नेऊन सोडावे. कालच एक वसंत कानेटकर लिखित एक प्रसिद्ध नाटक बघून आले. वाटलं AI ला कथानक विचारावे. तर मूळ विषय सोडून काहीही कथा येऊ लागल्या. पुन्हा शेवटी प्रश्न आहेच. मी अजून काही मदत करु शकतो का? दोन तास त्यात घालवले तरी इतक्या प्रसिद्ध नाटकाची कथा त्याने अजून सांगितलीच नाही. मग इतर गोष्टी लांबच!

मग या विषयी जे सध्याचे तंत्रज्ञान वापरतात म्हणजे आपलीच लेकरे, त्यांच्याशी चर्चा केली. तर असे कुठे विचारतात का? म्हणून त्यांनी वेड्यातच काढले. मग आमची चर्चा आणि मध्यंतरी काही वाचले होते ते आठवले.

AI विरुद्ध मानव (AI vs Human) हा सध्याच्या तंत्रज्ञानाच्या युगातील सर्वात मोठा चर्चेचा विषय आहे. कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) वेगाने प्रगत होत असली तरी, मानवी बुद्धिमत्तेला तिचा पर्याय नाही, असे अनेक तज्ज्ञांचे मत आहे.

मानवी क्षमता सर्वश्रेष्ठ आहे. मुंबईतील ७७% प्रोफेशनल कामाचे मोठे निर्णय घेताना AI पेक्षा स्वतःच्या निर्णयावर विश्वास ठेवतात.

AI ची उपयुक्तता: ७३% प्रोफेशनल AI चा वापर मसुदा तयार करण्यासाठी उपयुक्त मानतात, पूर्ण निर्णयासाठी नाही.

 AI मानवाची जागा घेणार नाही, तर मानवी क्षमतेत वाढ करेल. हे मानवी भावना आणि यंत्रांचे तर्कशास्त्र यांचे मिश्रण असेल.

एआयचे जनक जेफ्री हिंटन यांनीही एआयच्या घातक परिणामांबद्दल चिंता व्यक्त केली आहे, ज्यामुळे नोकऱ्या जाण्याची भीती आहे.

एआय चॅटबॉट्सचा चुकीच्या कामासाठी वापर (उदा. डीपफेक) समाजासाठी घातक ठरू शकतो.

योग्य नियोजन आणि मर्यादित वापर केल्यास AI मानवी जीवनासाठी वरदान ठरू शकते, परंतु मानवी विवेकबुद्धीला पर्याय नाही.

एआय आणि मानव यांच्यातील मुख्य फरक

मानव

माणूस सर्जनशील आहे.

उच्च कल्पना आणि भावनांवर आधारित निर्मिती करु शकतो. निर्णय क्षमता भावना, नैतिकता आणि अनुभव यावर आधारित असतात.

वेग व स्मृती मर्यादित असतात. संदर्भ हे नैसर्गिक समज व भावनांवर आधारित असतात.

AI

सर्वजनशीलता मर्यादित डेटा वर आधारित असते. वेग प्रचंड असतो. निर्णय क्षमता डेटा आणि अल्गोरिदमवर आधारित असते.

संदर्भ हे शिकवलेल्या माहितीवर आधारित असतात.

AI हे एक साधन आहे साध्य नाही.

आत्ता पर्यंत एवढेच समजले. अजून काही ज्ञानात भर पडेलंच! या कामी आपणही मदत कराल ना?

© विभावरी कुलकर्णी

मेडिटेशन,हिलिंग मास्टर व समुपदेशक, संगितोपचारक.

सांगवी, पुणे

📱 – ८०८७८१०१९७

≈ संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ खाणं आणि पिणं ! ! ☆ श्री प्रमोद वामन वर्तक ☆

श्री प्रमोद वामन वर्तक

? विविधा ?

🕺🤣 खाणं आणि पिणं ! 🤣😅  श्री प्रमोद वामन वर्तक ☆

लेखाच शिर्षक वाचून खवय्ये आणि पिवय्ये (हा मी न पिता शोधलेला शब्द) हे दोघंही खूप खूष झाले असतील ! तशी या दोन्ही कॅटेगरी मधल्या लोकांची आपल्याकडे कधीच कमतरता नव्हती आणि पुढील काळात यातील खवय्यांची संख्या जरी डाएटच्या नवं नवीन फ्याडामुळे कमी होतं गेली तरी पिवय्यांची संख्या पुढील काळात वाढतीच राहील, हे सांगायला कोणी कुठलंही पेय प्यायची गरज नाही ! कारण न पिणारा किंवा पिणारी ही जमात हल्ली जवळ जवळ नामशेष होत चालली आहे. त्याची कारणं वगैरेचा उहापोह करण्यासाठी आणि “पिणं” या एका शब्दावर लिहायचं झालं तर त्यासाठी एक वेगळा स्वतंत्र लेख लिहावा लागेल ! आणि तो सुद्धा “संध्याकाळी व्यवस्थित बसूनच” लिहावा लागेल, हे व्होडका आणि डिस्टील वॉटर इतकं पारदर्शक सत्य आहे ! वाचकहो आता नमनाला एवढं तुम्हाला “हाय” करून झाल्यावर, (झाला नसलात तरी) मूळ विषयाकडे माझी गाडी वळवतो.

आज मी हा जो “खाणं” शब्द घेतला आहे त्याचा आपल्या हातांशी आणि तोंडाशी काडीचा संबंध नाही. त्याच काय आहे नां मंडळी, आपली मराठी भाषा इतकी प्रगल्भ आहे की आपल्या या “अभिजात मराठी भाषेत” (इतक्या वर्षांनी कां होईना, पण मिळाला बाबा एकदाचा अभिजात भाषेचा दर्जा आपल्या माय मराठीला !) असे अनेक शब्द आहेत, की त्यातील एकेका शब्दाचे अनेक अर्थ होतात हे आपण सुज्ञ वाचक असल्यामुळे जाणताच. त्यामुळे खाणं हा शब्द वाचल्या वाचल्या आपल्या डोळ्यासमोर नाष्ट्यापासून आपल्याला आपल्या जेवणात असलेले आपले आवडीचे काही पदार्थ येणं, हे आपण खऱ्या अर्थाने खवय्ये नसालत तरी, स्वाभाविकच आहे. त्याला तुमचा इलाज नाही, पण मी “खाणं” या शब्दाचे आपल्याला जे अर्थ सांगणार आहे, त्याचा वर म्हटल्याप्रमाणे खऱ्या खाण्याशी काडीचा, अगदी टूथपीकइतका सुद्धा संबंध नाही ! त्यामुळे आपण थोडा डोक्याला ताण दिलात आणि पुढील लेख, डोक्यातील आणि डोळ्यासमोर आलेले खाण्याचे पदार्थ आणि मनांतली भूक काढून टाकून वाचलात, तर मी काय म्हणतोय ते आपल्या सारख्या प्रगल्भ वाचकांना नक्कीच कळेल. लेख वाचून झाल्या नंतरच आपण आपल्या रसना देवीला आपले आवडीचे खरं खाणं खाऊन तृप्त करावे अशी नम्र विनंती ! असो !

तर मंडळी, लहानपणी आपण सगळेच घरीदारी, शाळेत दंगामस्ती करत मोठे झालो हे जवळजवळ सगळेच वाचक मान्य करतील. त्यामुळे माझ्या पिढीतील (सध्या वय फक्त ७२!) त्या वेळच्या मास्तरांच्या हातचा मार मी कधीच खाल्ला नाही, हे असं कुणी म्हणणं निदान मला तरी न पटणार आहे. अर्थात “त्याकाळी” मुलींनी आणि मुलांनी केलेली दंगामस्ती यात, “हल्लीची” हिंसक दंगल आणि एखादा खरोखरचा निषेध मूक मोर्चा इतकं अंतर होत, हे ही तितकंच खरं. पण आत्ताची मुला मुलींची दंगामस्ती एकमेकांवर सर्वच बाबतीत कुरघोडी करण्यापर्यंत गेली आहे, हे ही एक आजच वास्तव आहे, यात दुमत असण्याचं कारण नाही. म्हणून आपले आई, वडील अथवा शिक्षक कितीही प्रेमळ असले आणि त्यांच्या हातचा मार आपण कधीच खाल्ला नसेल असं आपण गृहीत धरलं तरी, आपल्याला त्यावेळेस त्यांच्या हातांच्या ऐवजी कडक “शब्दांचा मार” नक्कीच खावा लागला असेल, हे आपण आत्ता तरी नक्कीच मान्य करायला हरकत नसावी !

कधी कधी आपण एकटेच आपल्या विचारांच्या तंद्रित बाहेर पडलेले असतो. डोक्यात काही ना काही विचारचक्र चालू असतं, काहीतरी टेन्शन असतं, कसली तरी समस्या भेडसावतं असते. बाहेर पडल्यावर फिरून आल्यावर जरा बरं वाटेल, या एकाच उद्देशाने आपण निरर्थकपणे निघालेलो असतो. अशावेळी आपल्या विचारांची तंद्री भंग करणारी आपल्या नावाची हाक आपल्या कानावर पडते. आपण हाक आलेल्या दिशेने चमकून बघतो तर आपल्याला एक ओळखीचा चेहरा दिसतो. त्याच नांव आठवायचा आपण प्रयत्न करतो पण तो पर्यंत तो जवळ येताच, आपण उसन हसून “काय कसा आहॆस?” असं विचारून वेळ मारून नेतो. नंतरचा पाऊण एक तास, आपल्याला ज्या विषयात अजिबात इंटरेस्ट नाही असे अनेक वेगवेगळे विषय काढून तो आपलं डोकं “खाण्यात” घालवतो आणि आपण सुद्धा न रागावता नाईलाजाने मधून मधून त्याच्या भाषणाला प्रतिसाद देत असतो ! त्याला जरा घाईत आहे असं सुचवून देखील, तो अट्टाहासाने आपल्या डोक्याबरोबर आपला (बहुमूल्य?) वेळ सुद्धा “खात” असतो !

Other side of the grass is always greener ! ही इंग्रजी म्हण, काही काही लोकांच्या बाबतीत अगदी बररोब्बर लागू पडते मंडळी ! म्हणजे कसं असतं नां, स्वतःकडे सगळं काही असलं तरी दुसऱ्याकडे असलेली आणि आपल्याकडे नसलेली एखादी वस्तू बघून, त्याच्यावर हे अल्पसंतुष्ट लोकं उगाचच “खार” खात असतात. पण त्यात त्यांचच नुकसान आहे हे कळण्याच्या पलीकडे त्यांची विचारांची उडी तो “खार” खाण्याच्या नादात पोहचतच नाही, त्याला आपण तरी काय करणार ? एखाद्याचा असा “खार” खाण्याचा स्वभाव बदलणं हे महाकर्म कठीण !

एखाद्या कलेत अथवा कुठल्याशा विषयात थोडी फार पारंगत असलेली व्यक्ती त्याला किंवा तिला ती कला कोणी सादर करायला सांगितली, तर काहीतरी कारण सांगून तो किंवा ती उगाच “भाव” खात असते ! अशावेळी आपण त्याला किंवा तिला कितीही आग्रह केला, तरी ती किंवा तो अजिबात बधत नाही म्हणजे नाहीच ! या मागे त्याच किंवा तिच अर्थकारण सुद्धा असू शकत असं मग अनेक माणसांना तसं नसलं तरी, वाटून जातं. या अर्थकारणावरून मला काही काही लोकांचं आजकाल बोकाळलेले दुसरच खाणं आठवलं. म्हणजे कसं आहे नां मंडळी, हल्ली काही काही लोकं कुठल्याही कामात “मेरा क्या?” असा सवाल करून, तर कधी कधी असा सवाल न करताच चक्क “पैसे खातात !” आणि अशी एखादी अती खादाड व्यक्ती जर चुकूनमाकून ACB च्या जाळ्यात अडकली तर त्याला बोल लावणारे लोकं, कारण कळेपर्यंत ऑफिसात “शेण खाल्लं” असेल असं बोलायला मोकळे ! मारणाऱ्याचा हात धरता येतो, पण बोलणाऱ्याच तोंड कसं धरणार? काय बरोबर नां?

एखाद्या भांडणाचं पर्यवसान हातघाईवर येण्या आधी जेंव्हा फक्त तोंडापर्यंत मर्यादित असतं तेंव्हा, दोन्ही भांडणारे गट एकमेकांना यथेच्छ “शिव्या खायला” घालतात ! अशावेळी झालेला “अपमान खाता” येत नाही आणि त्यासोबत आलेला राग सुद्धा खायचा म्हटलं तरी कोणी खाऊ शकत नाही. पण त्याला पर्याय म्हणजे अशावेळी आलेला राग आणि झालेला अपमान हे दोन्ही “गिळायची” सोय आपल्या अभिजात मराठी भाषेत आहे ! काही काही लोकं त्यांना आलेला राग व्यक्त करण्यात पण कमी पडतात आणि मग नाईलाजाने स्वतःचेच “दात ओठ” खात बसतात ! ही अशा लोकांची हतबलता मानली तरी त्याला सुद्धा काही लोकं ऐन मोक्याच्या ठिकाणी त्यानं “कच खाल्ली” असं म्हणून मोकळे होतात, आता बोला !

काही काही लोकांच बरं असतं, म्हणजे ते लोकं कुठे बाहेर चालले आहेत आणि आपण जर त्यांना हटकून विचारलं की “कुठं पर्यंत?” तर ते लगेच उत्तर देतात “जरा हवा खाऊन किंवा ऊन खाऊन येतो!” आता या दोन्ही खाण्यामुळे त्यांच पोट नक्कीच भरणार नसतं, तरी हवा खाऊन किंवा ऊन खाऊन असे शब्द सहजपणे त्यांच्या मुखातून बाहेर पडतात आणि त्या मागचा खरा अर्थ, विचारणारा सुद्धा लगेच जाणतो हीच आपल्या अभिजात मराठीची खरी खासियत आहे, असं म्हटलं तर वावगं ठरू नये ! काही लोकं बोलतांना सांभाषणातले अधले मधले “शब्दच खातात. ” जर का अशा माणसाचा तो ड्रॉबॅक संभाषण कर्त्याला ठाऊक असेल तर ठीक, नाहीतर एखाद्या नवख्या माणसाला तो नक्की काय बोलतोय हे कळण जरा अवघडच जातं मंडळी !

वाचकहो, लेखाच्या शीर्षकातल्या पहिल्या “खाणं” या शब्दाचा माझ्या बुद्धीप्रमाणे आणि मला माहित असलेल्या न खाण्याच्या प्रकारांच्या उल्लेखाने उहापोह करून झाल्यावर, आता दुसऱ्या “पिणं” या शब्दाकडे मी कधी येतोय, याची वाट अनेक पिय्यकड लोकं घसा सुखा करून वाट बघत असतील ! पण त्यांच्या पदरी आज तरी निराशा येणार आहे आणि त्याला माझा ईलाज नाही मंडळी ! म्हणजे मी या लेखाच्या सुरवातीलाच आपल्याला क्लिअर केलं होतं, की “पिणं” या शब्दावर लेख लिहायचा झाल्यास तो लिहिण्यासाठी एखाद्या “संध्याकाळी व्यवस्थित बसूनच” लिहावा लागेल, काय आठवतंय का ? आणि न खाणं खायचा हा लेख वाचायच्या नादात आपण जर ते विसरला असाल, तर आपल्याला मी पुन्हा एकदा आठवण करून देतो. लेखाचा पहिला परिच्छेद पुन्हा एकदा नीट वाचा ! आता तरी पटली खात्री तुमची ? मग आता मला सांगा, “पिणं” या शब्दावर मी लेख लिहावा असं ज्याला वाटतंय, तो मला त्याच्या घरी (अगदी कुठेही!) एखाद्या संध्याकाळी “व्यवस्थित बसायला” कधी बोलावतोय ? काय म्हणता, माझा पत्ता माहित नाही. अहो मंडळी, असं काय करता, लेखाच्या खाली माझं पूर्ण नांव, पत्ता आणि कॉन्टॅक्ट करण्यासाठी मोबाईल नंबर पण दिला आहे. मग वाट कसली बघता ? पटकन तुमचा मोबाईल उचला आणि माझी तुमच्या बरोबरची अशी एखादी “व्यवस्थित संध्याकाळ” आजच बुक करा !

आपल्या फोनची वाट बघणारा

आपलाच,

© प्रमोद वामन वर्तक

संपर्क – दोस्ती इम्पिरिया, ग्रेशिया A 702, मानपाडा, ठाणे (प.) ४०० ६१०

मो – 9892561086 ई-मेल – pradnyavartak3@gmail.com

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ अधिक मास ☆ शालिनी जोशी ☆

शालिनी जोशी

? विविधा ?

☆ अधिक मास ☆ शालिनी जोशी

यंदा ज्येष्ठ अधिक महिना आहे. रविवार तारीख १७ मे ते सोमवार दिनांक १५ जून २०२६ हा तो कालावधी. त्याविषयी थोडी माहिती.

भारतीय कालगणना चांद्र- सौर पद्धतीवरती आधारित आहे. म्हणजे महिन्यांची गणना चंद्राच्या गतीवर आणि ऋतूंची मांडणी सूर्याच्या गतीवर आहे. चंद्राला पृथ्वीभोवती एक फेरी पूर्ण करायला एक महिना लागतो. तोच चंद्रमास- तिथी हे एकक. एका महिन्यात ३० तिथी होतात. अमावस्या संपल्यानंतर प्रतिपदेपासून पुढील अमावस्येपर्यंत एक चंद्रमास होतो. हा साधारण २९•५ दिवसाचा असतो. म्हणून बारा महिन्यांचे २९•५ × १२ = ३५४ दिवस होतात. यानुसार सण ठरतात. चंद्र रोज वेगवेगळ्या नक्षत्रातून फिरतो. पौर्णिमेला चंद्र ज्या नक्षत्राच्या जवळ असतो ते नाव त्या महिन्याला दिले जाते. उदाहरणार्थ चित्रा नक्षत्राजवळ पौर्णिमेला असेल तर तो चैत्र महिना. विशाखा नक्षत्राजवळ पौर्णिमेला असेल तो वैशाख.

पृथ्वीला सूर्याभोवती प्रदक्षिणा करायला लागणारा काळ हा साधारण ३६५ दिवसांचा. हे सौर वर्ष. यानुसार ऋतू ठरतात. त्यामुळे दोन्ही पद्धतीत अकरा दिवसांचा फरक पडतो. सण दरवर्षी ११ दिवसांनी मागे सरकतात. हे असेच सुरू राहिले तर चैत्र हिवाळ्यात किंवा दिवाळी उन्हाळ्यात येईल. ऋतू आणि सण जुळणार नाहीत. ही विसंगती टाळण्यासाठी अधिक महिना ही संकल्पना. चांद्र वर्षात दोन वर्ष आठ महिन्यांनी, सण तीस दिवस मागे पडतात. म्हणून तिसऱ्या वर्षी एक अधिक महिना घेतला जातो. त्यामुळे सण व ऋतू यांचा मेळ बसतो. सूर्याच्या भासमान मार्गावर बारा राशी. प्रत्येक महिन्यात सूर्य एका राशीतून दुसऱ्या राशी प्रवेश करतो. मीन राशीतून मेष राशीत प्रवेश करतो तो चैत्र महिना असतो. मेष राशीतून वृषभ राशीत प्रवेश वैशाख महिन्यात. या बदलाला संक्रमण किंवा संक्रांत म्हणतात. काही वेळा अशी स्थिती येते की एका चांद्र महिन्यात सूर्याचा राशी बदल होत नाही म्हणजे संक्रांत येत नाही. ती पहिली अमावस्या संपण्यापूर्वी आणि दुसरी अमावस्या संपल्यानंतर येते. असा महिना अधिक ठरतो. उदाहरणार्थ आत्ताचा अधिक महिना जेष्ठ.

सूर्याचा वृषभ राशी प्रवेश शुक्रवार १५ मे ६:२१ मिनिटांनी आहे. नंतर अमावस्या रविवार तारीख १७ मे मध्यरात्री १:३१ ला संपते. आणि नंतरची अमावस्या १५ जून सकाळी८:२५ ला संपते. नंतर सूर्याचा वृषभ राशीतून मिथुन राशी प्रवेश होतो. म्हणजे या महिन्यात सूर्याचा राशी बदल नाही म्हणून हा अधिक मास. जेष्ठ अधिक मास आहे.

आणि पुढील नीजजेष्ठ आहे. सणवार नीज ज्येष्ठात करण्याची प्रथा आहे. त्यामुळे मागे आलेले सण पुढे जातात. उदाहरणार्थ गेल्यावर्षी १० जूनला असलेली वटपौर्णिमा २९ जूनला येणार. म्हणजे चंद्राचा महिना लहान व सूर्याचा मोठा तेव्हा अधिक मास.

अधिक टाकले म्हणून त्याला मलमास, अशुभ अपवित्र मानले गेले. तेव्हा तो व्यथित होऊन देवाकडे गेला. विष्णूला शरण गेला. विष्णूने श्रीकृष्णाकडे पाठवले. पूर्ण पुरुषोत्तम श्रीकृष्णाने त्याला स्वीकारले. म्हणून तो पुरुषोत्तम मास झाला. पवित्र, व्रत- वैकल्याचा महिना झाला. मुलगी व जावई लक्ष्मीविष्णू मानून त्याना वाण देण्याची प्रथा आहे. एकंदरीत संयम, नम्रता, आदर यांनी युक्त होऊन कुटुंबासाठी, समाजासाठी श्रेयस्कर काही करणे हे या महिन्यातील कर्तव्य समजावे. सातत्य महत्त्वाचे. पुरुषाकडून पुरुषोत्तमाकडे वाटचाल हा अधिक मासाच्या व्रतांचा उद्देश समजावा.

विज्ञान दृष्टीने हा चंद्र, सुर्य, पृथ्वी यांचा खेळ आहे. सण आणि ऋतु यांच्यात एकवाक्यता केली आहे. आपली सौर-चांद्र पद्धत खगोलशास्त्रावर आधारित आहे. दोन्ही कालगणनांशी जुळणारी सांस्कृतिक, पर्यावरणीय आणि खगोलीय सुत्रबद्धता असलेली अशी ही तर्कशुद्ध मांडणी आहे.

 (श्री. विनय जोशी आणि श्री. हेमंत मोने यांचे लेखावरून)

©  शालिनी जोशी

संपर्क – फ्लेट न .3 .राधाप्रिया  टेरेसेस, समर्थपथ, प्रतिज्ञा मंगल कार्यालयाजवळ, कर्वेनगर, पुणे, 411052.

मोबाईल नं.—9850909383

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ ‘अधिकमास ते चातुर्मास’ ☆ श्री दिवाकर बुरसे ☆

श्री दिवाकर बुरसे

🌸 विविधा 🌸

☆ ‘अधिकमास ते चातुर्मास’ ☆ श्री दिवाकर बुरसे

(भारतीय संस्कृतीतील ऋतुचक्र, अध्यात्म आणि उत्सवांचे अद्भुत सौंदर्य)

प्रस्तावना : निसर्गाशी मैत्री करणारी संस्कृती

जंबुद्वीपातील भरतखंड — आपले भारतवर्ष!

जगातील सर्वांत प्राचीन, समृद्ध आणि जीवनमूल्यांनी परिपूर्ण संस्कृतीचा वारसा लाभलेली ही भूमी केवळ कृषिप्रधान नाही, तर विज्ञाननिष्ठ, अध्यात्मप्रधान आणि निसर्गपूजक आहे.

येथील ऋषी-मुनींनी जीवनाकडे केवळ भौतिक नजरेने पाहिले नाही; तर मानव, निसर्ग आणि विश्व यांच्यातील सूक्ष्म नाते अनुभवले.

ऋतुचक्राच्या लयीत, सूर्य-चंद्रांच्या गतीत आणि निसर्गाच्या स्पंदनांत त्यांनी जीवनाचे शाश्वत तत्त्व शोधले.

भारतीय संस्कृतीने प्रत्येक ऋतूला अर्थ दिला, प्रत्येक तिथीला पावित्र्य दिले आणि प्रत्येक दिवसाला उत्सवाचे रूप दिले.

मानवाचे आरोग्य, मानसिक संतुलन, सामाजिक ऐक्य आणि आत्मिक उन्नती जपण्यासाठी व्रत-वैकल्ये, उत्सव, पर्व आणि संस्कारांची निर्मिती झाली.

यातूनच जन्माला आला —

भक्तिरसाने ओथंबलेला, रंगांनी नटलेला आणि अध्यात्माच्या तेजाने उजळलेला चातुर्मास!

अधिकमास : भारतीय कालगणनेतील अद्भुत विज्ञान

यावर्षीचे महत्त्वाचे दिनविशेष

 ▫️अधिकमासारंभ : १७ मे २०२६

 ▫️अधिकमास समाप्ती : १२ जून २०२६

▫️चातुर्मासारंभ : २५ जुलै २०२६

▫️चातुर्मास समाप्ती : २१ नोव्हेंबर २०२६

अधिकमास म्हणजे नेमके काय?

भारतीय सण-उत्सव हे चांद्रगतीवर आधारित आहेत, तर ऋतुचक्र सूर्याच्या गतीवर अवलंबून आहे.

या दोन्ही कालगणनांचा अद्भुत मेळ भारतीय ज्योतिषशास्त्राने साधला आहे.

चांद्रवर्ष आणि सौरवर्ष यांतील सूक्ष्म फरक भरून काढण्यासाठी जो अतिरिक्त महिना येतो, त्याला ‘अधिकमास’ म्हणतात.

तर एखादा महिना लुप्त झाला तर त्याला ‘क्षयमास’ म्हणतात.

दोन अधिकमासांमध्ये साधारणतः २७ ते ३४ महिन्यांचे अंतर असते.

चैत्र, वैशाख, ज्येष्ठ, आषाढ, श्रावण, भाद्रपद, आश्विन, कार्तिक आणि फाल्गुन हे महिने अधिकमास म्हणून येऊ शकतात.

मार्गशीर्ष आणि पौष हे क्षयमास होऊ शकतात; परंतु माघ मास कधीच अधिक किंवा क्षय होत नाही, हे विशेष!

क्षयमास म्हणजे काय?

कधी कधी एका चांद्रमासात सूर्य दोन राशींमध्ये प्रवेश करतो.

अशा वेळी त्या महिन्याला ‘क्षयमास’ म्हणतात.

विशेष म्हणजे, एखाद्या वर्षी क्षयमास आला तर त्या वर्षी दोन अधिकमास येतात.

अधिकमासाला पुरुषोत्तम मास किंवा मलमास अशीही नावे आहेत.

हजारो वर्षांपूर्वी निर्माण झालेले हे भारतीय कालगणनेचे विज्ञान आजही अचूक आहे — ही आपल्या पूर्वजांच्या प्रज्ञेची तेजस्वी साक्ष आहे.

अधिकमासाचे अध्यात्मिक महत्त्व

अधिकमास हा केवळ गणिती समतोल नाही;

तो आत्मशुद्धी, संयम आणि साधनेचा पवित्र कालखंड आहे.

या महिन्यात अनेक जण विविध व्रते आणि संकल्प करतात —

▫️ उपवास

▫️ एकभुक्त / नक्तभोजन

▫️ मौनभोजन

▫️ अखंड नंदादीप

▫️ तांबूलदान

▫️ गंगास्नान

▫️ मंत्रजप

▫️ विष्णुसहस्रनाम पारायण

“ॐ नमो भगवते वासुदेवाय”

या मंत्राच्या अखंड जपाने वातावरणही भक्तिमय आणि पवित्र बनते.

या काळात भगवान विष्णूच्या उपासनेला विशेष महत्त्व असते.

मनातील विकार धुऊन टाकून अंतःकरण अधिक निर्मळ करण्याचा हा आध्यात्मिक उत्सव आहे.

चातुर्मास : उत्सव, साधना आणि संस्कृतीचे महापर्व

आषाढातील शयनी एकादशी ते कार्तिकातील प्रबोधिनी एकादशी — हा चार महिन्यांचा कालखंड म्हणजे चातुर्मास.

हा काळ केवळ धार्मिक नसून ऋतुबदल, आरोग्य, पर्यावरण, शेती, अध्यात्म, कला आणि सामाजिक जीवन यांचा सुंदर समन्वय आहे.

आषाढ : भक्तिरसाचा प्रारंभ

🫟 कालिदास दिन

🫟 जगन्नाथ रथयात्रा

🫟 पंढरपूरची वारी

🫟 गुरुपौर्णिमा

🫟 दिव्याची आवस

आषाढात भक्तीचा पहिला वर्षाव मनावर होतो.

वारकऱ्यांच्या टाळ-मृदंगात, विठ्ठलनामाच्या गजरात आणि पावसाच्या सरींत भक्तिरस दाटून येतो.

श्रावण : व्रत-वैकल्यांचा हिरवा महिना

श्रावण म्हणजे भक्ती, पावित्र्य आणि मंगलमयतेचा उत्सव!

🪻 रविवार — सूर्यपूजा

🪻 सोमवार — शिवआराधना

🪻 मंगळवार — मंगळागौरी

🪻 बुधवार-गुरुवार — बुध-बृहस्पती पूजन

🪻 शुक्रवार — जिवती पूजन

🪻 शनिवार — बलभीम दर्शन

याच महिन्यात येतात —

🪻 नागपंचमी

🪻 नारळी पौर्णिमा

🪻 राखी पौर्णिमा

🪻 स्वातंत्र्यदिन

🪻 गोकुळाष्टमी

🪻 पिठोरी अमावस्या

🪻 बैलपोळा

श्रावणातील हिरवाई जशी धरतीला सजवते, तशीच भक्ती मनालाही प्रसन्न करते.

भाद्रपद : गणरायाच्या आगमनाचा जल्लोष

🍁 हरतालिका

🍁 गणेश चतुर्थी

🍁 ऋषीपंचमी

🍁 गौरी आगमन

🍁 अनंत चतुर्दशी

🍁 पितृपक्ष

भाद्रपद म्हणजे भक्ती, कुटुंबभाव आणि परंपरेचा मंगल सोहळा.

“गणपती बाप्पा मोरया”च्या जयघोषात घराघरांत आनंदाचे तरंग दाटून येतात.

अश्विन : शक्ती आणि प्रकाशाचा उत्सव

🔅 घटस्थापना

🔅 नवरात्रोत्सव

🔅 विजयादशमी

🔅 कोजागिरी पौर्णिमा

🔅 वसूबारस

🔅 दीपावली

या महिन्यात संपूर्ण भारत प्रकाश, उत्साह आणि मंगलमयतेने उजळून निघतो.

अंधारावर प्रकाशाचा आणि अन्यायावर धर्माचा विजय साजरा केला जातो.

कार्तिक : भक्तीचा परमोच्च क्षण

कार्तिकातील प्रबोधिनी एकादशी — चातुर्मासाची सांगता.

वारकरी चंद्रभागेत स्नान करतात आणि विठ्ठलनामाच्या गजरात भक्तीचा महासागर दुमदुमतो.

असे मानले जाते की आषाढी एकादशीला योगनिद्रेत गेलेले भगवान विष्णू या दिवशी जागृत होतात आणि पुन्हा विश्वकारभार सांभाळण्यासाठी सज्ज होतात.

चातुर्मास : भारतीय जीवनसंस्कृतीचा आत्मा

चातुर्मास म्हणजे —

✨ भक्तीचा महोत्सव

✨ ऋतुचक्राचा उत्सव

✨ निसर्गाशी संवाद

✨ कुटुंबसंस्कृतीचा उत्सव

✨ कला, संगीत आणि परंपरेची मेजवानी

या काळात प्रत्येक घर उत्सवांनी, पूजा-अर्चेने, भजन-कीर्तनांनी आणि स्नेहमेळाव्यांनी गजबजून जाते.

समारोप : परंपरा म्हणजे अंधश्रद्धा नव्हे

हजारो वर्षांच्या चिंतनातून, अनुभवातून आणि विज्ञाननिष्ठ जीवनदृष्टीतून घडलेल्या भारतीय परंपरा या केवळ धार्मिक कर्मकांड नाहीत.

त्या आहेत —

☘️ निसर्गसंवर्धनाची शिकवण

☘️ आरोग्यसंरक्षणाची जीवनपद्धती

☘️ सामाजिक ऐक्याची वीण

☘️ आत्मिक उन्नतीचा मार्ग

म्हणूनच या समृद्ध, बहुरंगी आणि जीवनमूल्यांनी परिपूर्ण परंपरांची टिंगल किंवा कुचेष्टा करणे हे पुरोगामित्वाचे नव्हे, तर सांस्कृतिक दारिद्र्याचे लक्षण ठरते.

भारतीय संस्कृती ही केवळ इतिहास नाही;

ती अखंड वाहणारी जीवनगंगा आहे —

ऋतूंप्रमाणे बदलणारी, पण मुळात शाश्वत असलेली!

🌼 मंगल शुभेच्छा 🌼

अधिकमास आणि चातुर्मासाचा हा चिरंतन उत्सव आपल्या जीवनात भक्ती, आनंद, समाधान आणि समृद्धी घेऊन येवो!

🙏🏻

© श्री दिवाकर बुरसे

पुणे

संपर्कः ९२८४३००१२५, ९५५२६२९२४५

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares