आषाढाच्या धूसर पाऊलखुणा मागे टाकत श्रावण जेव्हा अंगणात येतो तेव्हा निसर्गाच्या चेहऱ्यावर एक वेगळीच प्रसन्नता खुलते..आकाशाच्या निळ्या ओठांवर काळ्या मेघांची हळवी कुजबुज सुरू होते आणि क्षितिजावर पावसाच्या रेशमी पडद्याआड हिरवाईचे स्वप्न आकार घेते. श्रावण म्हणजे केवळ निसर्गाने परिधान केलेला हिरवा शालू आहे.. मातीच्या कपाळावर उमटलेले पावसाचे कुंकू आहे आणि मनाच्या कोपऱ्यात अलगद जागवणारी आठवणींची सनई आहे म्हणूनच श्रावण आला की मन नकळत म्हणते
‘हा ऋतू आहे की आनंदाची एखादी अवखळ लहर? ’
श्रावणाच्या आगमनाची चाहूल लागताच वातावरणात जादू भरते. काळेकुट्ट ढग आकाशात जमू लागतात. क्षणभर सूर्य त्यांच्यामागे लपतो आणि पुढच्याच क्षणी पावसाच्या टपोऱ्या थेंबांची रिमझिम सुरू होते.. ते थेंब जणू आभाळाने पृथ्वीच्या कुशीत पाठवलेली मोत्यांची पत्रेच असतात… कोरड्या मातीवर पहिला पाऊस पडतो आणि मातीचा सुगंध चारही दिशांना दरवळतो.. त्या सुगंधात बालपण दडलेले असते, शेतकऱ्याचे स्वप्न असते आणि जगण्याची नवी उमेदही असते.
श्रावणाचा पाऊस कधी शांत, कधी खट्याळ तर कधी धुवांधार असतो.. कधी तो खिडकीच्या काचेवर बोटांनी टपटप वाजवत गुपित सांगतो तर कधी छपरावर ढोल वाजवत बेभान नाचतो… कधी रिमझिम सरींच्या रूपाने तो आकाशातून उतरतो तर कधी मुसळधार धारांनी पृथ्वीला चिंब भिजवून टाकतो.. त्याच्या या लहरी स्वभावामुळेच तो खरा ‘”अवखळ श्रावण’” वाटतो. एखाद्या लहान मुलासारखा तो क्षणात हसतो, क्षणात रडतो आणि पुन्हा क्षणात खळखळून हसवतो.
शेतांच्या बांधावर तर श्रावणाने हिरव्या रंगाची उधळणच केलेली असते… कालपर्यंत उन्हाने करपलेली जमीन आज हिरव्या गालिच्याने नटलेली दिसते… भाताची कोवळी रोपे वाऱ्याच्या तालावर डोलू लागतात.. ज्वारी-बाजरीची पिके पावसाशी कुजबुजतात.. रानफुलांचे रंगीत ठिपके हिरव्या चादरीवर विखुरलेल्या तारकांसारखे भासतात.. झाडांच्या फांद्यांवर नव्या पालवीचे दागिने चमकतात नी वेली झाडांना बिलगून जणू प्रेमाची मिठीच मारतात.. निसर्गाचा हा साज पाहताना डोळे तृप्त होतात आणि मनाला एक अनामिक शांतता लाभते..
श्रावण म्हणजे पक्ष्यांचाही उत्सव.. पावसाच्या सरींमध्ये भिजत कोकिळेचा मधुर स्वर दूरवर ऐकू येतो.. चिमण्या घरट्याच्या उंबरठ्यावर बसून पावसाकडे कुतूहलाने पाहतात. मोर तर श्रावणाचा जणू राजदूतच..! काळ्या ढगांचे दर्शन होताच तो पिसारा फुलवतो आणि निळ्या-हिरव्या रंगांची इंद्रधनुषी आरास करीत नाचू लागतो.. त्याच्या नृत्यात आनंदाचा उन्माद असतो. त्याला पाहून वाटते की जणू काही पृथ्वीनेच आकाशाच्या प्रेमात पडून नृत्य सुरू केले आहे.
श्रावणाच्या दिवसांना धार्मिक आणि सांस्कृतिक रंगही लाभलेला असतो.. मंदिरांच्या घंटानादाने वातावरण मंगलमय होते… सोमवारी शिवमंदिरांत भक्तांची गर्दी होते. हिरव्या बांगड्यांची खणखण, हातांवरील मेंदीचा सुगंध आणि झुल्यांवरील हास्य यामुळे गावोगावचे वातावरण उत्साहाने भरून जाते. नागपंचमी, मंगळागौर, नारळी पौर्णिमा, रक्षाबंधन अशा सणांनी श्रावण अधिकच रंगतदार होतो.. प्रत्येक सणामागे निसर्गाशी आणि मानवी जीवनाशी जोडलेले प्रेमाचे, कृतज्ञतेचे आणि नात्यांचे धागे असतात.
मंगळागौरीच्या रात्री तर गावातील अंगणे जागी होतात. पारंपरिक खेळ, फुगड्या, गाणी आणि हास्य यांच्या लयीने रात्र बहरते. कुठे झोका उंच जातो, कुठे बांगड्यांचा नाद घुमतो तर कुठे आजीच्या जुन्या श्रावणी आठवणी नव्या पिढीच्या कानात अलगद उतरतात.. त्या क्षणी काळ जणू थांबतो आणि भूतकाळ व वर्तमान एकाच झुल्यावर झुलू लागतात..
शहरातला श्रावणही तितकाच मोहक असतो फक्त त्याचे रूप वेगळे असते.. रस्त्यांवर छत्र्यांची रंगीबेरंगी गर्दी दिसते.. पावसाने धुतलेल्या इमारती नव्याने उजळून निघतात.. गरमागरम चहाचा कप हातात घेऊन खिडकीतून कोसळणाऱ्या सरींकडे पाहण्यात एक विलक्षण आनंद असतो. कांदा भजी, वाफाळता चहा आणि बाहेर बरसणारा पाऊस
या त्रिवेणी संगमाला कोण नकार देईल?
मात्र श्रावणाचा खरा अर्थ केवळ रोमँटिक पावसात नाही.. या ऋतूमागे शेतकऱ्याच्या आशेची धडधडही आहे. पाऊस वेळेवर पडला तर शेत हिरवेगार होते पाऊस दगा देतो, तर त्या हिरवाईवर काळजीची सावली पडते. त्यामुळे श्रावणातील प्रत्येक थेंब हा शेतकऱ्यासाठी अमृताचा थेंब असतो. त्याच्या डोळ्यांतल्या आशेचे प्रतिबिंब हिरव्या शिवारात दिसते.
श्रावण हा बाहेरच्या निसर्गाला जितका भिजवतो तितकाच तो मनालाही चिंब करून जातो…
श्रावण संपताना मनाला एक हुरहूर लागते. झाडांच्या पानांवरून ओघळणारे थेंब जणू निरोपाचे अश्रू वाटतात.. आकाश स्वच्छ होते, ढग दूर निघून जातात पण श्रावणाने मनात पेरलेली हिरवाई तशीच राहते.. पावसाचा सुगंध, मोराचा नाच, झुल्याची उंच भरारी, सणांची लगबग आणि ओल्या मातीचा गंध
या साऱ्या आठवणी मनाच्या कप्प्यात कायमच्या साठून राहतात…
असा हा अवखळ श्रावण..! कधी सरींच्या रूपाने हसणारा, कधी ढगांच्या रूपाने रुसणारा, कधी मोराच्या पिसाऱ्यात नाचणारा तर कधी मातीच्या सुगंधातून मनाला स्पर्शणारा. तो निसर्गाचा उत्सव आहे… भावनांचा झरा आहे आणि नवजीवनाची चाहूल आहे म्हणूनच श्रावण आला की मनाच्या आकाशातही काळे ढग दाटतात पण त्या ढगांतून बरसतो तो पाऊस नव्हे तर आनंद, आठवणी आणि जगण्याची नवी हिरवी उमेद.!
मौन म्हणजे चूप राहणं, निशब्द असणं. मौन पाळणं, म्हणजे न बोलणं.
मौन पाळणं जर साधलं तर आपल्या जिभेवर आपला संयम राहतो. मौनात एक विलक्षण सामर्थ्य आहे. न बोलता खूप काही साधता येतं.
मौन राहून एखादं काम करताना एकाग्रता वाढते. वाढलेली एकाग्रता कामातली उत्कटता वाढवते. काम अधिक चांगले होतं.
कधी कधी बोलून सांगून न जमणाऱ्या गोष्टी मौन साधून साधता येतात. मौन साधणारा अंतर्मुख होतो. त्यामुळे तो आत्मपरीक्षण करू शकतो. वरवर सोपी, साधारण वाटणारी क्रिया; आत्मिक उन्नतीचा साधा मार्ग आहे. जसे पैसे वापरले की संपतात. वापर केल्याने वीज संपते, पाणी संपते आणि त्यातील ऊर्जा संपत्ती नष्ट होते. त्याचप्रमाणे आपण बोलून आपली ऊर्जा, आपली शक्ती नष्ट करतो. विजेचा संचय केल्यास ऊर्जा साठून राहते. अगदी त्याचप्रमाणं, मनाचं मौन पाळल्यास आपल्या अंतरीक ऊर्जेचा ऱ्हास थांबतो. आपली शक्ती वाढते.
योग्य वेळी शांत राहणं महत्त्वाचे असतं. मौनामुळं भांडणं, वादविवाद टाळता येतात. शांतता टिकून राहते.
तसं पाहिलं तर, वाणी ही मानवाला मिळालेली देणगी आहे. डोळे, नाक, कान, त्वचा आणि याबरोबरच जीभ हे देखील महत्त्वाचं ज्ञानेन्द्रिय आहे. जिभेचा उपयोग आपण बोलण्यासाठी आणि चव घेण्यासाठी करतो. दोन्हींचा अतिरेक घातकच ठरतो. मौनव्रत म्हणजे मानसिक तपच आहे. परंतु वाणीला विराम देणं इतकं सोपं नाही. सर्वांनाच ते जमत नाही. आपल्यामध्ये काहीजण असे असतात की, त्यांच्या तोंडात तीळही भिजत नाही. न बोलता राहणं अशक्यप्राय असतं बऱ्याच जणांच्यासाठी! त्यांची जीभ सतत चालू असते. विषय कोणताही असो, त्यातील काही माहिती नसली, तरी ते बोलत असतात. बोलण्यासाठी काही असो वा नसो पण त्यांच्या बडबडीत खंड पडत नाही.
समंजस लोक कमी बोलतात.त्यांना त्याचे काही फायदेही मिळतात. काही गोष्टी साध्य होतात.
मौन पाळणं म्हणजे तोंडानं न बोलणं एवढाच मर्यादित अर्थ नाही हं. खाणाखुणा करणं, लिहून दाखवणं, चेहऱ्यावर विविध भाव प्रगट करणं, मान हलवणं यातलं काहीही न करता राहणं म्हणजे खरं मौन. मौनकाळात व्यावहारिक गोष्टींचा विचार करायचा नसतो. कोणते; अगदी कोणतेच विचार मनात आणायचे नसतात. चित्ताची एकाग्रता वाढवण्याचा प्रयत्न मात्र करत राहायचं असतं. म्हणून चिंतन करण्याची कला मौनव्रतामुळे शिकून घेता येते. त्यामुळे विकारांवर ताबा मिळवता येतो. काम, क्रोध, मोह, लोभ, मद आणि मत्सर असे विकार मनात उत्पन्न होत असतात. मनातील विचारांनी या षड्रिपुंना खतपाणी घातलं जातं. विचारांमुळे शरीराची ऊर्जा खर्ची पडते. अस्वस्थता वाढते. केवळ वाणीनेच नाही तर, मनातल्या मनात बोलणेही बंद करता आलं पाहिजे. मग या षड्रिपुंना जिंकता येईल. म्हणून नेहमी नेहमी नाही तरी, प्रसंग परत्वे मौन पाळायला काय हरकत आहे? कारण मुद्देसूद प्रसन्नता देणारं, आनंद देणारं बोलणं ही एक संवाद कला आहे. शब्द चुकले की गोंधळ होतो.
शब्दामुळे दंगल, शब्दांमुळे मंगल|
शब्दाचे हे जंगल, जागृत रहावं||
जिभेवरी ताबा, सर्व सुखदाता |
पाणी, वाणी, नाणी नासू नये ||
तुकाराम महाराजांनी लिहिलेल्या या ओळी किती सार्थ आहेत! जिभेवर ताबा मिळवला पाहिजे हे खरंच आहे.
कधी कधी मौनातही संवाद असतो. म्हणून मौन हे एक असं साधन आहे, जे न बोलता ही सांगण्याचं काम करतं. अर्धा ओरडा करून जे सांगता येत नाही ते मौनात सांगता येतं. मौन म्हणजे स्वतःच्या गोंधळलेल्या भावनांचं संयोजनही असू शकतं. मौन ही एक सकारात्मक, विधानात्मक शैली आहे. शक्तिशाली शैली आहे. कारण, मौन पाळणाऱ्यांच्या आजूबाजूचे लोकही ही व्यक्ती का बोलत नाही, याचा विचार करता करता अंतर्मुख होतात आणि न बोलता प्रश्न सुटतात. म्हणूनच मौन म्हणजे विरोध नाही तर मौन एक परीक्षण आहे.
☆ “छापील पुस्तकापासून माणूस दूर जाईल का?” ☆ श्री जगदीश काबरे ☆
किंडलसारख्या वाचन ऍपचा, भ्रमणध्वनीचा, संगणकाचा आणि विविध प्रकारच्या इलेक्ट्रॉनिक पुस्तकांचा वाढता वापर पाहता माणसाच्या वाचनाच्या सवयींमध्ये मोठा बदल होत आहे, हे नाकारता येत नाही. पूर्वी पुस्तक वाचण्यासाठी छापील पुस्तक हातात घेणे अपरिहार्य होते; पण आज त्याच पुस्तकाचे इलेक्ट्रॉनिक रूप सहज उपलब्ध होते. एका छोट्याशा भ्रमणध्वनीत किंवा वाचनयंत्रात शेकडो, हजारो पुस्तके साठवता येतात. प्रवासात, प्रतीक्षेत किंवा घराबाहेर असतानाही वाचन करता येते. अक्षरांचा आकार बदलणे, प्रकाशाची तीव्रता नियंत्रित करणे, शब्दाचा अर्थ तत्काळ शोधणे, पुस्तकातील एखादा उतारा शोधणे आणि वाचन जिथे थांबले तिथून पुढे सुरू करणे अशा सुविधा इलेक्ट्रॉनिक वाचनाला अधिक सोयीच्या बनवतात. त्यामुळे पुढील काळात इलेक्ट्रॉनिक वाचनाचे प्रमाण निश्चितच वाढत जाण्याची शक्यता आहे. परंतु इलेक्ट्रॉनिक वाचन वाढले म्हणजे छापील पुस्तके पूर्णपणे नष्ट होतील, या निष्कर्षावर उडी मारणे घाईचे ठरेल. करण इतिहासात प्रत्येक नवीन माध्यमाच्या आगमनावेळी जुन्या माध्यमाच्या अंताची भविष्यवाणी करण्यात आली होती; पण तसे काही घडले नाही. जसे की चित्रपट आल्यावर रंगभूमी संपेल असे मानले गेले, दूरदर्शन आल्यावर चित्रपटगृहे बंद पडतील असे वाटले, संगणक आल्यावर कागदाचा अंत होईल असे सांगितले गेले आणि भ्रमणध्वनी आल्यावर दूरध्वनीचे जुने प्रकार नाहीसे होतील असे मानले गेले. प्रत्यक्षात झाले असे की नवीन माध्यमांनी जुन्या माध्यमांचे स्वरूप, वापर आणि सामाजिक स्थान बदलले; त्यांना सर्वस्वी नष्ट केले नाही. पुस्तकाबाबतही अशीच प्रक्रिया घडण्याची शक्यता अधिक आहे. इलेक्ट्रॉनिक पुस्तक छापील पुस्तकाची जागा काही क्षेत्रांत घेईल; परंतु छापील पुस्तकाचे अस्तित्व त्यामुळे संपेलच असे नाही. या मागील एक महत्त्वाचे कारण म्हणजे पुस्तक हे केवळ माहिती साठविण्याचे साधन नसून ती एक सांस्कृतिक वस्तू आहे. पुस्तकाच्या कागदाचा स्पर्श, त्याचा वास, मुखपृष्ठ, पान उलटण्याची क्रिया, पुस्तकावर केलेल्या खुणा, एखाद्या जुन्या पुस्तकातून मिळणारी आठवणींची अनुभूती आणि स्वतःचा पुस्तकसंग्रह असणे यांना इलेक्ट्रॉनिक पुस्तके पूर्णपणे पर्याय होऊ शकत नाहीत. एखाद्या व्यक्तीच्या आयुष्यातील एखाद्या पुस्तकाला काही विशिष्ट कारणांमुळे भावनिक मूल्य प्राप्त झालेले असते. मग ते पुस्तक केवळ मजकूर राहत नाही; ते एखाद्या काळाची, व्यक्तीची, विचाराची किंवा जीवनानुभवाची स्मृती बनते. त्यामुळे ज्ञानाच्या वापरासाठी इलेक्ट्रॉनिक माध्यम अधिक उपयुक्त ठरले, तरी पुस्तकाच्या सांस्कृतिक आणि भावनिक मूल्यामुळे छापील पुस्तक टिकून राहण्याची शक्यता मोठी आहे.
भ्रमणध्वनीवर वाचताना वाचक सतत इतर सूचनांच्या, संदेशांच्या, चित्रफितींच्या आणि सामाजिक माध्यमांच्या आकर्षणात असतो. त्यामुळे दीर्घकाळ एका विषयावर एकाग्र होऊन वाचण्याची क्षमता कमी होण्याचा धोका आहे. छापील पुस्तक वाचताना पुस्तक आणि वाचक यांच्यामध्ये इतर डिजिटल व्यत्यय तुलनेने कमी असतात. म्हणून गंभीर साहित्य, तत्त्वज्ञान, इतिहास, समाजशास्त्र किंवा विज्ञान यासारखे विषय सखोलपणे वाचण्यासाठी छापील पुस्तकाला अजूनही पर्याय नाही. इलेक्ट्रॉनिक माध्यम वाचन अधिक सुलभ करते; पण सुलभता आणि एकाग्रता या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. पूर्वी एखादे पुस्तक मिळवण्यासाठी ग्रंथालयात जावे लागे किंवा पुस्तक विकत घ्यावे लागे. आज इलेक्ट्रॉनिक माध्यमांमुळे जगातील अनेक ग्रंथ काही क्षणांत उपलब्ध होऊ शकतात. दुर्मिळ पुस्तके, जुन्या आवृत्त्या, संशोधनग्रंथ आणि विविध भाषांतील साहित्यही डिजिटल स्वरूपात मिळू शकते. त्यामुळे भौगोलिक अंतर, पुस्तकांची उपलब्धता आणि काही प्रमाणात आर्थिक अडथळे कमी होतात. विशेषतः विद्यार्थ्यांसाठी आणि संशोधकांसाठी ही क्रांती अत्यंत महत्त्वाची आहे.
याहून महत्त्वाचा बदल म्हणजे पुढील पिढ्यांसाठी पुस्तक या शब्दाचा अर्थच बदलू शकतो. आज पुस्तक म्हटले की अनेकांच्या मनात कागदाची पाने, मुखपृष्ठ आणि बांधणी असलेली वस्तू येते. भविष्यात एखाद्या तरुणाच्या दृष्टीने पुस्तक म्हणजे वाचण्यासाठी उपलब्ध असलेली डिजिटल सामग्री असू शकते. जसे आज अनेक तरुणांना पत्र लिहिण्याची जुनी पद्धत अपरिचित आहे, तसेच भविष्यातील काही पिढ्यांना छापील पुस्तक हे मुख्य वाचनमाध्यम वाटणार नाही. परंतु याचा अर्थ ते पुस्तक हातात घेऊन वाचणे विसरतील असा होत नाही. म्हणून लोक पुस्तके वाचणे विसरतील असे म्हणण्यापेक्षा लोक पुस्तके वाचण्याची पद्धत बदलतील हे विधान जास्त संयुक्तिक ठरेल. त्यामुळे छापील पुस्तकाचा ऱ्हास काही विशिष्ट क्षेत्रांत अधिक वेगाने होऊ शकतो. संदर्भग्रंथ, शब्दकोश, वर्तमान घडामोडींशी संबंधित साहित्य, शैक्षणिक सामग्री आणि त्वरित शोध घेण्यासाठी लागणारी माहिती यासाठी डिजिटल रूप अधिक सोयीचे आहे. अशा सामग्रीसाठी मोठमोठी पुस्तके जवळ बाळगण्याची आवश्यकता कमी होईल. परंतु कादंबऱ्या, कविता, आत्मचरित्रे, कलात्मक पुस्तके, संग्रहणीय आवृत्त्या आणि भेट म्हणून दिली जाणारी पुस्तके यांना छापील पुस्तकांच्या स्वरूपात मागणी राहू शकते. म्हणजे भविष्यात छापील पुस्तकाचे प्रमाण कमी होईल, पण त्याचे अस्तित्व अधिक निवडक आणि विशिष्ट स्वरूपाचे होण्याची शक्यता आहे.
या बदलाकडे केवळ तंत्रज्ञानाच्या दृष्टिकोनातून पाहणेही योग्य नाही. पुस्तक वाचण्याची सवय टिकवणे हा समाजाच्या बौद्धिक आरोग्याचा प्रश्न आहे. माध्यम कोणतेही असो, दीर्घ लेख वाचण्याची, तर्क समजून घेण्याची, विचारांशी असहमती नोंदवण्याची, कल्पनाशक्ती वापरण्याची आणि एखाद्या विषयावर शांतपणे चिंतन करण्याची क्षमता टिकणे अधिक महत्त्वाचे आहे. भ्रमणध्वनीवर हजारो पुस्तके उपलब्ध असूनही जर माणूस फक्त लहान संदेश, शीर्षके आणि चित्रफिती पाहत राहिला, तर माहितीची उपलब्धता वाढूनही सखोल ज्ञान मिळवण्याची ओढ कमी होऊ शकते. उलट एखादा माणूस इलेक्ट्रॉनिक पुस्तकात तल्लीन होऊन शेकडो पाने वाचत असेल तर त्याचे वाचन छापील पुस्तकाइतकेच अर्थपूर्ण असू शकते. म्हणून भविष्यातील संघर्ष हा छापील पुस्तक आणि इलेक्ट्रॉनिक पुस्तक यांच्यातील नसून सखोल वाचन आणि वरवरच्या माहितीत रममाण होणे यात असणार आहे. छापील पुस्तक कदाचित आजच्या सारखे सर्वत्र दिसणार नाही. पुस्तकांची दुकाने, ग्रंथालये आणि घरातील पुस्तकांचे कपाट यांचे स्वरूपही बदलू शकते. परंतु माणसाला विचार समजून घेण्यासाठी, कल्पना आत्मसात करण्यासाठी आणि स्वतःशी संवाद साधण्यासाठी पुस्तकाची गरज लागणारच आहे. कारण माध्यम बदलले तरी ज्ञानाची आणि चिंतनाची गरज संपत नाही.
त्यामुळे भविष्यात लोक छापील पुस्तके वाचणे विसरून जातील हा अंदाज अतिशयोक्त आहे. अधिक वास्तववादी अंदाज असा वर्तवता येईल की छापील पुस्तक हे वाचनाचे एकमेव प्रमुख माध्यम राहणार नाही; तर इलेक्ट्रॉनिक वाचनाचे प्रमाण वाढेल एवढेच. परंतु छापील पुस्तक पूर्णपणे नाहीसे होणार नाही. भविष्यात दोन्ही माध्यमे परस्परपूरक असतील. ज्यांना वेग, उपलब्धता आणि सोय महत्त्वाची वाटेल ते इलेक्ट्रॉनिक पुस्तकांकडे वळतील; ज्यांना पुस्तकाचा स्पर्श, संग्रह, सौंदर्य, स्मृती आणि एकाग्र वाचनाचा अनुभव महत्त्वाचा वाटेल ते छापील पुस्तकाकडे परततील. अखेरीस बदलणार आहे तो पुस्तकाचा आकार आणि माध्यम; माणसाची वाचण्याची आणि जाणून घेण्याची मूलभूत गरज नाही. त्यामुळे छापील पुस्तकांपासून वाचक दूर जाईल हा समज गैरसमजच आहे असे म्हटले तर वावगे ठरू नये.
लहानपणी ज्या काही गोष्टींबद्दल प्रसाद (हातावर, गालावर, आणि पाठीवर) मिळाला असेल तो या दोन गोष्टींबद्दल जास्त असेल. (देवाचा) प्रसाद हा प्रेमाने तळहातावर ठेवला जातो व तो खाल्ला जातो. पण फाटणं आणि फाडणं यामुळे मिळणारा प्रसाद हा तळहातापासून पाठीपर्यंत अंगावर पडला होता. त्यासाठी जागेचं म्हणजे शरीराच्या भागाच, आणि जागेच म्हणजे कुठे आहोत याच बंधन नव्हत. आणि गोडवा… त्याचा तर संबंधच नसायचा.
फाटणं यात वस्तूच नुकसान असत. तर फाडणं बहुतेक वेळा मुद्दाम केल जात. फाटणं यात दुर्लक्ष, निष्काळजीपणा असतो. तर फाडणं यात काळजीपूर्वक करायचं कांहीही नसत. फाटणं यात दु:ख असत, तर फाडण्यात दु:खाचा संबंध असेलच अस नाही.
हा कागद कोणी फाडला… किंवा कसा फाटला… अथवा हे कागद काही कामाचे नसतील तर फाडून टाकू… फाडणं हा शब्द साधारण अशाच प्रकारच्या वाक्यात ऐकायला येतो. किंवा यात जे घडलं तीच क्रिया फाडणं यात अपेक्षित असते.
फाडणं याला व्यवस्थितपणा लागत नाही. यासाठी कोणतही मोजमाप नसत. याला कोणतही शास्त्र, किंवा सुत्र नाही. सुसूत्रता तर मुळीच लागत नाही. ऊलट व्यवस्थितपणे केलेला अव्यवस्थितपणाच यात अपेक्षित असतो. मनाला येईल तसे आणि तेवढे तुकडे करणं यालाच आपण फाडणं म्हणतो.
पण फक्त याच अर्थाने हा शब्द वापरतो का… तर मुळीच नाही. बर्याच चांगल्या गोष्टींसाठीसुध्दा फाडणं हा शब्द वापरतो, आणि त्यात बोलणारा आणि ऐकणारा यांना गैर वाटत नाही.
वर्गणी किंवा इतर चांगल्या ठिकाणी पैसे मिळाल्यावर दिली जाणारी पावती. याला पावती फाडणं असच म्हणतात. चांगल्या मनाने, चांगल्या कामासाठी दिलेल्या पैशांची पोचपावती देतांना त्या पावतीचा फाडणं असा ऊल्लेख होतो.
लग्न ठरल्यावर केली जाणारी कपड्यांची खरेदी. याला कपडा फाडायचा आहे असाच ऊल्लेख खान्देशात तरी सहज केला जातो. परत हा शब्द वापरतांना उत्साह जाणवतो. अशा कपडे फाडण्याच्या कार्यक्रमाला काहींना मानाने यायला सांगितल जातं. बर्याचदा तर अशा वेळी पंधरावीस जणं असल्याच मी पाहिलं आहे. काहीतर दुकानाच्या बाहेरच असतात. दुकानात साडी फाडली जाते आहे का शर्ट पीस आणि पॅट पीस हे त्यांना दिसतही नाही. पण कपडा फाडायच्या कार्यक्रमास ते हजर असतात.
एखादी गोष्ट घडल्यानंतर त्याच्या चांगल्या किंवा वाईट गोष्टींच श्रेय, यश, अपयश कुणाच्या नावावर असेल, याला सुध्दा याचं बील कोणाच्या नावावर फाडायचं असाच प्रश्न मनात असतो. काही तर या यशासाठी आपणच असल्याचा दावा करतात. तर अपयशाच खापर कोणावर फोडाव याचा घाट घालतात.
असच बील फाडणं वस्तूच्या खरेदीनंतर सुध्दा असतं. आपल्या नांवाने जे बील फाडलं जात ती वस्तू आपण आनंदाने घेतलेली असते, बर्याचदा त्याचं बील संभाळून सुध्दा ठेवतो, पण वस्तू घेतांना त्याच बील मात्र फाडल जात.
दुध नासणं याला सुध्दा काही ठिकाणी दुध फाटलं असच म्हणतात. द्रवरूप पदार्थ नासतो, सांडतो. पण दुध मात्र फाटतं. दुधाचा चक्का करायचा असेल तर मात्र दुध मुद्दाम फाडलं जात. पण मला दुध फाटलं या शब्दाची गंमत वाटते.
९ ऑगस्ट रोजी झालेल्या जागतिक आदिवासी दिनाच्या निमित्ताने:
जागतिक आदिवासी दिन : निसर्गसंस्कृतीचा गौरव
ज्यांच्या पावलांनी जंगलाला वाटा मिळाल्या, ज्यांच्या श्वासांनी पर्वतांना जीवन मिळाले आणि ज्यांच्या संस्कृतीने निसर्गालाच देवत्व बहाल केले त्या आदिवासी समाजाला कृतज्ञ अभिवादन करण्याचा दिवस म्हणजे जागतिक आदिवासी दिन.
“जंगल आहे म्हणून जीवन आहे आणि जीवन आहे म्हणून संस्कृती आहे, ” ही भावना ज्या समाजाच्या जगण्याच्या प्रत्येक श्वासात दडलेली आहे तो म्हणजे आदिवासी समाज… निसर्गाशी सुसंवादी नाते, श्रमाला प्रतिष्ठा, सामूहिक जीवनपद्धती आणि सांस्कृतिक वैभव यांमुळे आदिवासी समाज मानवसंस्कृतीचा एक महत्त्वपूर्ण घटक ठरतो… दरवर्षी ९ ऑगस्ट हा दिवस जागतिक आदिवासी दिन म्हणून साजरा केला जातो. हा दिवस केवळ एका समाजाचा गौरव करण्यासाठी नसून त्यांच्या परंपरा, संस्कृती, ज्ञान आणि निसर्गाशी असलेल्या अतूट नात्याचा सन्मान करण्यासाठी आहे.
भील, गोंड, वारली, संथाल, मुंडा, कोरकू, कातकरी, कोलाम, ठाकूर अशा अनेक जमाती भारताच्या सांस्कृतिक समृद्धीत भर घालतात. प्रत्येक जमातीची स्वतंत्र भाषा, लोकपरंपरा, श्रद्धा, कला, लोकनृत्य आणि जीवनपद्धती आहे. या विविधतेतून भारतीय संस्कृतीचे विशाल रूप अधिक उजळून दिसते… आदिवासी म्हणजे केवळ डोंगर-दऱ्यांत राहणारे लोक नव्हेत… ते निसर्गाचे खरे रक्षक आहेत. झाडे, नद्या, पर्वत, वन्यजीव आणि पृथ्वी यांना ते केवळ संसाधने मानत नाहीत तर कुटुंबातील सदस्यांप्रमाणे जपतात. त्यांच्या लोकगीतांत निसर्गाचे सौंदर्य आहे, लोकनृत्यांत जीवनाचा उत्सव आहे आणि लोकपरंपरांत पर्यावरण संवर्धनाचा अमूल्य संदेश आहे.
आदिवासी समाजाचे जीवन निसर्गाशी एकरूप झालेले आहे. जंगल, डोंगर, नद्या आणि वनसंपत्ती हे त्यांच्या जीवनाचे आधारस्तंभ आहेत. पर्यावरणाचे संतुलन राखण्याचे ज्ञान त्यांनी अनुभवातून आत्मसात केले आहे… आज जग पर्यावरण संवर्धनाची चर्चा करत असताना आदिवासी समाजाने ती हजारो वर्षांपूर्वीच आपल्या जीवनात उतरवली होती तसेच ही जीवनमूल्ये ही शतकानुशतके आपल्या आचार-विचारांत जपली आहेत.. त्यांनी वृक्ष तोडण्याआधी त्याची क्षमा मागितली, नदीत उतरतानाही तिचा आदर राखला आणि जंगलाचा उपयोग करतानाही त्याचे संरक्षण केले. निसर्गाशी संघर्ष नव्हे, तर सहजीवन हेच त्यांचे जीवनतत्त्व आहे. म्हणूनच त्यांच्या संस्कृतीत पृथ्वीच्या भविष्याचे मौल्यवान ज्ञान दडलेले आहे… त्यांचे पारंपरिक ज्ञान हे केवळ सांस्कृतिक नव्हे तर पर्यावरणीय दृष्टीनेही अत्यंत मौल्यवान ठरते.
आदिवासी समाज हा भारताच्या संस्कृतीच्या इंद्रधनुष्यातील एक तेजस्वी रंग आहे. त्यांच्या लोकगीतांत मातीचा सुगंध दरवळतो, लोकनृत्यांत स्वातंत्र्याचा आनंद डोलतो तर त्यांच्या चित्रकलेत निसर्गाचे स्पंदन जिवंत होते. त्यांच्या जीवनात कृत्रिमतेला स्थान नाही साधेपणा हीच त्यांची श्रीमंती आणि श्रम हीच त्यांची पूजा आहे. पहाटेच्या दवबिंदूप्रमाणे त्यांचे जीवन निर्मळ तर उंच डोंगराप्रमाणे त्यांचा स्वाभिमान अढळ आहे… सभ्यतेच्या झगमगाटात अनेकदा विस्मरणात गेलेल्या या समाजाने निसर्गाच्या कुशीत राहून मानवाला जगण्याची खरी कला शिकवली. त्यांनी जंगलाला संपत्ती नव्हे तर आई मानले, नद्यांना केवळ पाण्याचा प्रवाह नव्हे तर जीवनाची गंगा समजले आणि पृथ्वीला उपभोगाची वस्तू नव्हे तर पूजनीय माता मानले.
भारतातील आदिवासी समाजाने देशाच्या इतिहासातही मोलाचे योगदान दिले आहे. स्वातंत्र्यलढ्यात अनेक आदिवासी वीरांनी आपल्या प्राणांची आहुती दिली… अनेक आदिवासी वीरांनी अन्यायाविरुद्ध संघर्ष करत स्वातंत्र्याची ज्योत प्रज्वलित ठेवली… भारतीय स्वातंत्र्यलढ्यात आदिवासी समाजाचे योगदान उल्लेखनीय आहे… त्यांच्या संघर्षाची गाथा इतिहासाच्या पानांत सुवर्णाक्षरांनी लिहिली गेली आहे. त्यांच्या बलिदानामुळे स्वातंत्र्य, स्वाभिमान आणि न्याय या मूल्यांची जपणूक अधिक बळकट झाली… स्वातंत्र्यानंतरही शिक्षण, आरोग्य, रोजगार आणि सामाजिक न्याय या क्षेत्रांत अनेक आव्हानांचा सामना करत त्यांनी विकासाच्या प्रवाहात स्वतःचे स्थान निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे तरीही विस्थापन, वनहक्क, शिक्षणातील असमानता, कुपोषण, बेरोजगारी आणि सांस्कृतिक ओळख जपण्याची समस्या आजही गंभीर स्वरूपात दिसून येते.
आज आधुनिकतेच्या वेगवान प्रवाहात अनेक आदिवासी परंपरा आणि बोलीभाषा लुप्त होण्याच्या मार्गावर आहेत. जंगलांचे क्षेत्र कमी होत आहे, विस्थापन वाढत आहे आणि त्यांच्या पारंपरिक जीवनपद्धतीसमोर अनेक आव्हाने उभी राहत आहेत. तरीही त्यांनी आपल्या संस्कृतीची ओळख, परंपरेचा अभिमान आणि निसर्गाविषयीची निष्ठा जपली आहे. ही चिकाटी आणि आत्मसन्मान प्रत्येकासाठी प्रेरणादायी आहे.
जागतिक आदिवासी दिन आपल्याला एक महत्त्वाचा संदेश देतो विकास हा सर्वसमावेशक असला पाहिजे. शिक्षण, आरोग्य, रोजगार, जमीन, वनहक्क आणि सामाजिक न्याय या प्रत्येक क्षेत्रात आदिवासी समाजाला समान संधी मिळणे आवश्यक आहे. त्यांच्या पारंपरिक ज्ञानाचा सन्मान करून आधुनिक विज्ञानाशी त्याची सांगड घालणे ही काळाची गरज आहे. कारण निसर्गाशी सुसंवाद साधून जगण्याची कला जगाला शिकविण्याची ताकद आदिवासी संस्कृतीत आहे.
आज आपण पर्यावरण संवर्धन, जैवविविधता आणि शाश्वत विकास यांविषयी चर्चा करतो परंतु हे विचार आदिवासी समाज शतकानुशतके आपल्या जीवनातून जगत आला आहे म्हणूनच त्यांच्याकडे केवळ सहानुभूतीने नव्हे तर आदराने आणि समतेच्या दृष्टीने पाहणे आवश्यक आहे. त्यांच्या संस्कृतीचे जतन करणे म्हणजे आपल्या देशाच्या सांस्कृतिक वैभवाचे संरक्षण करणे होय…
जागतिक आदिवासी दिन हा विविधतेतील एकतेचा, मानवतेचा आणि निसर्गप्रेमाचा उत्सव आहे… हा केवळ उत्सव नाही तर आत्मपरीक्षणाची संधी आहे. आदिवासी समाजाला विकासाचा समान अधिकार देताना त्यांच्या सांस्कृतिक अस्मितेचे संरक्षण करणे, त्यांच्या ज्ञानपरंपरेचा सन्मान करणे आणि पर्यावरणपूरक जीवनशैलीचा स्वीकार करणे, हीच या दिवसाची खरी शिकवण आहे. आदिवासी संस्कृतीचे जतन म्हणजे मानवतेच्या प्राचीन शहाणपणाचे जतन होय म्हणूनच विविधतेचा सन्मान, समानतेची जाणीव आणि निसर्गाशी सुसंवाद या मूल्यांच्या आधारे आपण अधिक न्याय्य, समृद्ध आणि संवेदनशील समाजाची उभारणी करूया… आदिवासी संस्कृतीचे अस्तित्व टिकले तरच निसर्गाचे संतुलन आणि मानवतेचे भविष्य अधिक समृद्ध, सुंदर आणि सुरक्षित राहील हाच जागतिक आदिवासी दिनाचा खरा संदेश आहे… जंगलातील प्रत्येक हिरवे पान पृथ्वीचा श्वास जपते तसेच आदिवासी समाज भारताच्या संस्कृतीचा आत्मा जपतो. त्यांच्या अस्तित्वाचा सन्मान म्हणजे निसर्गाचा सन्मान, आणि त्यांच्या प्रगतीचा मार्ग म्हणजे भारताच्या उज्ज्वल भविष्याचा मार्ग होय.
दरवर्षी ९ ऑगस्ट रोजी साजरा होणारा जागतिक आदिवासी दिन हा केवळ एका समाजाचा उत्सव नाही तर मानवसंस्कृतीच्या आद्य वारशाला अर्पण केलेला सन्मानाचा मुजरा आहे.
संस्कृत मध्ये अहं म्हणजे मी. अर्थात अहंकार म्हणजे मी पणा. मी करतो तेच बरोबर असा विचार जिथं येतो, तिथं त्या क्षणापासून मीपणा पोसला जाऊ लागतो.
जी व्यक्ती अशी अहंकारी असते ती, स्वतःच्या विचारांना मतांना जास्त महत्त्व देते. इतरांचं मत, विचार किंवा त्या गोष्टीकडं बघण्याचा दृष्टिकोन समजून घेऊ शकत नाही. अशी व्यक्ती दुसऱ्यांना कमी लेखू लागते. कोणालाही न जुमानता आपण करतो तेच बरोबर असं वाटू लागतं. समोरच्या व्यक्तीला किरकोळ मानून त्या व्यक्तीकडं, दुर्लक्ष करणं सुरू होतं. दुसऱ्यांच्या भावनांचा विचार न करण्याची वृत्ती हे एक या मागचं कारण आहे. स्वतः विषयी अभिमान वाटणं हे जसं नैसर्गिक, तशी अहंकार ही देखील नैसर्गिक भावना आहे. स्वतःच्या यशाचा अती गर्व, मी इतरांपेक्षा श्रेष्ठ कसा हे सांगण्याची धडपड या गोष्टीतून ही भावना वाढीस लागते. काही वेळा असुरक्षितता, सतत आपलंच कौतुक व्हावं ही अपेक्षा अशा गोष्टींमुळे ही भावना मोठी होते. कधी कधी संपत्ती, रूप, बुद्धिमत्ता याला कारणीभूत ठरतात; तर कधी नोकरीत, कुटुंबात अधिकारामुळे आलेला गर्व वाढीस लागतो, तट्ट फुगतो आणि अहंकाराच्या फुग्यात रूपांतरित होतो.
आपणच तेवढे हुशार आपल्याला कोणाची गरज नाही मी समर्थ आहे अशा धुंदीत ही माणसं वावरत असतात. स्वतःच्या नजरेत स्वतःला मोठे समजू लागतात. अचानक कधीतरी या माणसांची फजिती होते. कुणालाही न विचारता मोठे मोठे व्यवहार करताना फाजील आत्मविश्वासनं मोठे निर्णय घेतले जातात. हितचिंतकांना बेदखल केले जाते. परंतु हा निर्णय चुकीचा ठरला तर फजिती होऊ शकते मोठे संकट उडवू शकते.
गर्व किंवा अहंकार हा माणसाचा शत्रू आहे. अहंकाराने उद्ध्वस्त झालेल्या माणसांची अनेक उदाहरणं आहेत. अहंकार हा षड्रिपुंपैकी एक रिपू आहे. शक्ती, बुद्धी, संपत्ती, रूप याचा माणसाला अभिमान जरूर असावा पण त्या अभिमानाचं रूपांतर गर्वात किंवा अहंकारात होणार नाही याची काळजी घेणं जरुरीच आहे आणि महत्त्वाचं आहे.
अहंकार कमी करण्याचा प्रयत्न करत राहायला हवा. त्यासाठी अंगी नम्रता हा गुण बाणवायला पाहिजे. नेहमी नम्र राहायला हवं. इतरांचं ऐकून घ्यायला हवं. सतत शिकण्याची वृत्ती ठेवायला हवी. आपली चूक झाली असेल, तर ती मान्य ही करायला हवी. दुसऱ्यांचा वेगळा दृष्टिकोन समजून घेतला तर, आपलीही समज वाढते. अहंपणा कमी करण्यास ही गोष्ट उपयुक्त ठरते.
विजय माझाच होणार, मीच जिंकणार, माझंच बरोबर असा हेका धरू नये. प्रत्येक वादात मीच बरोबर असं होणार नाही. कधी कधी दुसरा जिंकू शकतो, तर कधी समोरच्याचं म्हणणं ऐकून वाट वाद मिटवणं जास्त फायदेशीर ठरतं. असे समोपचारानं वागणं जमलं तर अहंकार कमी होण्यास मदत होते.
“जै जगा धाकुटे होईजे | तै जवळीक माझी ||” असे ज्ञानोबा म्हणतात.
जगाला मी जितका लहान आहे असे वाटेल तितके जग माझ्या जवळ येईल. समाजात मिसळायला, लोकांना आपलंस करायला पाहिजे असेल, तर आपण आधी लहान व्हायला हवं. साधेपणा अंगात असेल तर लोक संपत्ती वाढते. लोकसंग्रह वाढतो. अहंकाराचा लवलेश जिथे नाही तिथे, आपुलकी वाढ वाढते. जवळीक वाढते, स्नेहभाव वाढतो हाच खरा ज्ञानजन्य निरहंकार होय.
शरीराची तसेच मनाची कामं प्रकृतीच्या नियंत्रणाखाली चालतात. पण अहंकाराच्या आधीन गेलेला माणूस स्वतःला सर्व गोष्टींचा कर्ता समजतो. असा माणूस स्वतःला दु:खाच्या खाईत लोटून देतो. हे दु:ख नको असेल तर, भगवद्गीतेच्या तिसऱ्या अध्यायातील हा श्लोक आपण आचरणात आणण्याचा प्रयत्न केला पाहिजे.
☆ महावस्त्राचे पदर – भाग ८ ☆ श्री विश्वास देशपांडे ☆
‘आत्या’ (माहेरच्या मायेचा एक हळवा कोपरा)
नात्यांना काही नावे असतात आणि काही नात्यांना सुगंध असतो. नाव उच्चारलं की नातं समोर येतं; पण काही नाती आठवली की मनात एखादा गंध दरवळतो… जुन्या घराचा, अंगणातल्या तुळशीचा, उन्हाळ्याच्या सुट्टीचा, चुलीवरच्या स्वयंपाकाचा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मायेचा!
‘नात्यांचं महावस्त्र’ विणताना आपण आतापर्यंत आईची ‘मायेची पैठणी’, बाबांची ‘सह्याद्रीची ढाल’, आजीची ‘संस्कारांची शिदोरी’, आजोबांचे ‘सुरकुत्यांमधील शहाणपण’, मामाचा ‘माहेरचा समृद्ध दुवा’ आणि मावशीची ‘आईची प्रतिछाया’ अनुभवली. या महावस्त्रात असाच एक अत्यंत हळवा, आपुलकीचा आणि माहेर-सासर या दोन घरांना जोडणारा रेशमी धागा म्हणजेच ‘आत्या’!
तुम्ही म्हणाल, कशासाठी सांगत आहात ही नाती? तर नात्यांनीच कुटुंब आणि समाज जोडला जातो. आपलं जीवन समृद्ध होतं ते नात्यांमुळेच ना! आपल्याला एकट्याला काय महत्त्व आहे?
जशी आईची बहीण म्हणजे मावशी, तशी वडिलांची बहीण म्हणजे आत्या. मावशी आणि आत्या… नावं वेगळी आहेत, नाती वेगळी आहेत; पण माया आणि प्रेम यात फरक नाही. कदाचित व्यक्तिपरत्वे थोडाफार फरक कोणाला जाणवू शकेल, पण त्याचा विचार इथे आपल्याला करायचा नाही.
वडिलांच्या बहिणीला आपण ‘आत्या’ म्हणतो. नात्यांच्या व्याख्येत ही माहिती अगदी पुस्तकी आणि बरोबर आहे; पण भावनेच्या कोशात ‘आत्या’ या शब्दाचा अर्थ एवढाच नसतो. आत्या घरातील सगळ्या नात्यांना व्यापून उरते. आत्या म्हणजे बाबांच्या माहेरची जिवंत आठवण.
पण मला वाटतं, बाबा लहान असताना ज्या गावी राहिले, ज्या घरात राहिले आणि आई-बाबा आदी ज्या व्यक्तींसोबत राहिले, ते ठिकाण म्हणजे त्यांचं माहेरच! एखाद्या स्त्रीला आपल्या माहेरची जेवढी ओढ असते, तेवढीच ओढ बाबांनाही त्यांनी बालपण जिथे घालवलं, ज्यांच्यासोबत घालवलं त्या नातेवाईकांची आणि मित्रांची असते. आणि आत्या म्हणजे बाबांच्या बालपणाची साक्षीदार! एकाच घरात वाढलेले, बरोबर जेवलेले, दंगामस्ती केलेले, छोट्या-मोठ्या कारणांवरून भांडलेले, रुसलेले आणि पुन्हा हसलेले. आपल्या बाबांना ‘अरे’ म्हणून हक्काने हाक मारणाऱ्या मोजक्या व्यक्तींमधली ती एक! आणि म्हणूनच कदाचित ‘आत्या’ या नात्यात आपल्या बाबांच्या बालपणाचा एक सुंदर तुकडा दडलेला असतो.
आईच्या माहेरची माणसं आपल्याला ‘मामा’, ‘मावशी’, ‘आजोबा’, ‘आजी’ म्हणून लहानपणापासूनच जवळची वाटतात. पण बाबांच्या माहेरची माणसंही तितकीच आपली असतात, हे जाणवायला कधी कधी थोडा वेळ लागतो. कारण वडील स्वतःच्या भावना फारशा बोलून दाखवत नाहीत; त्यांच्या माहेरच्या आठवणींचा कप्पा ते सहज उघडत नाहीत. पण जेव्हा आत्या घरी येते, तेव्हा बाबांच्या चेहऱ्यावर अचानक एक वेगळंच निष्पाप बालपण उमलतं.
”अरे, तू अजूनही तसाच आहेस!”
आत्याने बाबांना असं म्हटलं की आपण आश्चर्याने बाबांकडे पाहतो. कारण आपल्यासाठी ते शिस्तप्रिय बाबा असतात, पण आत्यासाठी तो अजूनही तिचा लहान भाऊ असतो! त्यांच्या बालपणीच्या खोड्या, भांडणं, रुसवे-फुगवे, शाळा, खेळ, आईचा धाक आणि वडिलांची शिस्त… सगळं काही तिच्या स्मरणात ताजंतवानं आणि जिवंत असतं. जसा अनेक वर्षांपूर्वीचा एखादा फोटोंचा अल्बम पाहताना आठवणी जाग्या होतात, तसाच बालपणीच्या आठवणींचा अल्बम आत्या आली की उघडला जातो. म्हणूनच आत्या म्हणजे केवळ एक नातं नाही; ती आपल्या वडिलांच्या हरवलेल्या बालपणाची खरीखुरी साक्षीदार असते.
बालपणात आत्या म्हणजे एक वेगळीच लाडकी व्यक्ती असते. उन्हाळ्याच्या सुट्टीत आत्याच्या गावाला जाणं म्हणजे जणू एखादी आनंदी सहलच! तिच्या घरात गेल्यावर आईच्या घरापेक्षा थोडं अधिक स्वातंत्र्य मिळतं. खाण्यापिण्याच्या बाबतीतही तिचा हात थोडा सैलच असतो. “अरे, घे ना अजून एक!” आई समोर असताना ज्या गोष्टीसाठी दहा वेळा विचार करावा लागतो, ते आत्याकडे एकदाच मागितलं की मिळतं! आणि आईने जर आत्याकडे आपल्या मुलाच्या खोड्यांची तक्रार केली, तर आत्या बहुतेक वेळा मुलांचीच बाजू घेते.
”असू दे गं… मुलंच आहेत. थोडं खेळणार, थोडा दंगा करणार!”
आत्याच्या या एका वाक्यात भाच्याला मिळालेला हक्काचा जामीन असतो! पण आत्या फक्त लाड करणारी नसते, वेळ आली तर ती प्रेमाने समजही देते. आई रागाने बोलते, बाबा शिस्तीने बोलतात आणि आत्या मायेने समजावते. तिच्या बोलण्यात अधिकार असतो, पण त्या अधिकाराला मायेची रेशमी किनार असते.
माझ्या लहानपणाच्या अनेक आठवणी आत्याशी जोडल्या गेल्या आहेत. त्या आठवणी लिहायच्या म्हटलं, तर आत्याच्या उल्लेखाशिवाय त्या पूर्ण होणारच नाहीत. तसं तर मला दीर्घकाळ आत्याची माया लाभली. मी लहान असताना, नोकरीला लागल्यानंतर तसेच पुढे लग्न झाल्यावरही तिने माझं भरभरून कौतुक केलं आहे. माझी आत्या कल्याणला राहायची. आत्या आणि तिचे यजमान यांनी माझ्या मनावर उत्तम संस्कारांचं शिंपण केलं, त्यातून मी खूप काही शिकलो.
माझं लहानपण एका अगदी छोट्या खेड्यात गेलं. पण आत्या कल्याणला राहत असल्याने मी दर सुट्टीत तिच्याकडे जायचो. ग्रामीण भागात राहत असलेल्या माझ्यासारख्या अजाण मुलाला शहरी संस्कृतीचा स्पर्श आणि ओळख तिच्यामुळे झाली. आत्याच्या यजमानांनी स्वतः माझ्यासोबत फिरून त्यावेळची मुंबई मला दाखवली आणि अनेक गोष्टींची माहिती दिली. त्यांनीच मला तेव्हा ‘मनाचे श्लोक’ हे पुस्तक भेट दिलं होतं. ते मला म्हणाले होते, “विश्वास, हे श्लोक पाठ कर. ते पाठ झाले की मला सांग.” त्याप्रमाणे मी तेव्हा सगळे श्लोक पाठांतर केले होते. त्यांनी त्यावेळी मला एक वही आणि पेन बक्षीस म्हणून दिले होते.
आज इतकी वर्षं उलटून गेली, तरी ती वही, ते पेन आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे ते ‘मनाचे श्लोक’ अजूनही माझ्या हृदयात कोरलेले आहेत. पुढे याच ‘मनाचे श्लोकां’शी माझं नातं इतकं दृढ होईल आणि त्यावर माझ्याकडून एक विस्तृत लेखमाला लिहिली जाईल, याची त्या वेळी मला कल्पनाही नव्हती! माझे आतेभाऊही माझ्यापेक्षा मोठे होते, पण त्यांनीही मैत्रीच्या नात्याने माझ्याशी वागून मला खूप प्रेम दिलं आणि बऱ्याच गोष्टी शिकवल्या.
काही नाती केवळ भेटीगाठींनी टिकत नाहीत; ती आठवणींच्या मुळांनी टिकतात. काळ जसजसा पुढे जातो, आपण मोठे होतो आणि मग शिक्षण, नोकरी, संसार, मुलं… प्रत्येक जण आपापल्या जगात रमतो. आत्याच्या घरच्या फेऱ्या कमी होतात, फोनवरच्या गप्पा कमी होतात. ‘नंतर बोलू’ म्हणता म्हणता असे अनेक ‘नंतर’ निघून जातात; पण नात्यातील ‘अंतर’ कधीच वाढत नाही.
आजच्या काळात कुटुंबाची व्याख्याही बदलली आहे. पूर्वी एकत्र कुटुंबात आत्याचं येणं-जाणं सहज असायचं. घर मोठं होतं, माणसं जास्त होती, अंगण मोठं होतं, माणसांची मनंही मोठी होती आणि वेळही भरपूर होता. पण आता काळानुसार सगळ्याच गोष्टींचा संकोच झाला आहे. माणसं जवळ असूनही वेळ दूर निघून गेला आहे. पूर्वी आत्या अचानक दारात उभी राहायची, “काय गं, आलीस?” असा प्रश्न विचारण्याआधीच घरात तिच्या स्वागताची तयारी व्हायची! आज कोणीच अचानक येत नाही. आधी फोन येतो—”वेळ आहे का? तुम्ही घरी आहात का?” सगळ्याच गोष्टी बदलल्या.
आत्याच्या नात्यात आणखी एक सुंदर गोष्ट असते. ती आपल्या आईची नणंद असली, तरी अनेकदा आईची जिवाभावाची मैत्रीणही असते. दोघी एकत्र आल्या की जुन्या आठवणींची पेटी उघडते. बाबांच्या बालपणातील गमतीशीर किस्से बाहेर येतात आणि मग आपल्याला कळतं—आपले बाबा ज्या व्यक्तीला ‘माझी बहीण’ म्हणतात, तिच्यासाठी ते अजूनही ‘दादा’ किंवा ‘भाऊ’च आहेत. लग्नातील किंवा इतर कौटुंबिक कार्यक्रमांच्या आठवणी निघतात; घर काही क्षण का होईना, पुन्हा हसतं-खेळतं होतं.
भावाबहिणीचं नातंही अतिशय विलक्षण असतं. लहानपणी एकमेकांशी क्षुल्लक गोष्टीवरून भांडणारे, मोठे झाल्यावर एकमेकांच्या संकटात धावून जाणारे! संसाराच्या वाटेवर दोघे वेगवेगळ्या घरात गेले, तरी मनाच्या एखाद्या कोपऱ्यात त्यांचं माहेरचं घर कायम राहतं; आणि त्या माहेरच्या घराची एक जिवंत खूण असते—‘आत्या’.
म्हणूनच, दुर्दैवाने जेव्हा वडील जग सोडून जातात, तेव्हा आत्याला होणारं दुःख फक्त भावाच्या जाण्याचं नसतं; तिच्या आयुष्यातील एक संपूर्ण मोठा अध्याय बंद झाल्याचं असतं. ‘माझा भाऊ’ म्हणत ज्याच्याशी ती आयुष्यभर बोलली, भांडली, हसली, रुसली… त्याचा आवाज अचानक कायमचा शांत झालेला असतो. त्या वेळी आत्याच्या डोळ्यांतून वाहणारे अश्रू पाहताना आपणही अंतर्मुख होतो. तेव्हा जाणवतं की नाती केवळ रक्तावर आधारित नसतात, आठवणींची मुळे त्याहून खूप खोल गेलेली असतात!
आत्या आणि भाचा-भाची यांचं नातंही तितकंच सुंदर. आई-वडिलांच्या शिस्तीच्या चौकटीबाहेर मायेची एक मोकळी खिडकी उघडी ठेवणारी व्यक्ती म्हणजे आत्या! भाच्यांच्या यशात मनापासून आनंद मानणारी आणि त्यांच्या अपयशातही त्यांना प्रेमाने धीर देणारी. आज भाचा मोठा झाला, त्याला स्वतःची मुलं झाली, तो स्वतः बाबा झाला; तरी आत्याच्या नजरेत तो अजूनही तोच छोटासा मुलगा असतो. “किती मोठा झालास रे!” हे वाक्य आत्या जितक्या वेळा म्हणते, तितक्या वेळा आपल्याला जाणवतं की तिच्या मनात आपण कधीच मोठे झालेले नसतो. आणि आजच्या कृत्रिम जगात ही गोष्ट किती दिलासा देणारी असते!
आत्याला हिंदीत ‘बुआ’ म्हणतात. अनेक हिंदी चित्रपटांतून, मालिकांतून आणि कथांमधून हे नातं आपल्याला डोकावताना दिसतं. पण भाषा बदलली की नातं बदलत नाही. ‘आत्या’ म्हटलं की जशी आपल्या मनात मायेची एक ओळखीची प्रतिमा उभी राहते, तशीच ‘बुआ’ म्हटलं की हिंदी भाषिकांच्या मनातही! शब्द वेगळे, उच्चार वेगळे; पण नात्याची ऊब मात्र तीच! ‘बुआ’ या शब्दातही एक वेगळीच गोडी आहे. हिंदी घरात कदाचित “बुआ के घर चलो!” असं म्हटलं की बालपणाला आनंदाची चाहूल लागते, आणि मराठी घरात “आत्याकडे चल!” म्हटलं की बालपणाला पंख फुटतात! पण दोन्हीकडे स्वागत करणारा मायेचा हात मात्र अगदी सारखाच असतो. कारण नाती भाषेच्या सीमा मानत नाहीत—‘आत्या’ असो की ‘बुआ’!
आजच्या डिजिटल युगात नाती एका क्लिकवर जोडली जातात आणि एका क्लिकवर दूरही जातात. व्हिडिओ कॉलवर चेहरे दिसतात, संदेशांमध्ये शुभेच्छा येतात. पण आत्याने हातावर ठेवलेला उबदार हात, डोक्यावरून फिरवलेली मायेची थाप आणि “काळजी घे रे!” म्हणताना तिच्या आवाजात उतरलेली खरीखुरी काळजी… याला जगात कोणत्याही डिजिटल तंत्रज्ञानाचा पर्याय नाही.
वय वाढतं तसं माणसाला महागड्या भेटवस्तूंपेक्षा माणसं अधिक हवीहवीशी वाटतात—विशेषतः आपल्या माहेरच्या आठवणींशी जोडलेली माणसं. कारण ज्या घरातून ती कधीतरी सासरी गेली, त्या घरातील माणसं, आवाज, हसणं-रडणं, रुसवे-फुगवे, सण-उत्सवांची लगबग… सगळं तिच्या मनात कुठतरी जिवंत असतं. तिच्या माहेरच्या आठवणींचा शेवटचा धागा कधी कधी तिच्या भावाच्या मुलांशी जोडलेला असतो.
म्हणूनच आत्याला भेटणं म्हणजे केवळ एका नातेवाईकाला भेटणं नव्हे! ते आपल्या वडिलांच्या बालपणाला भेटणं असतं. आपल्या कुटुंबाच्या जिवंत इतिहासाला भेटणं असतं. आणि आपल्या स्वतःच्या बालपणातील एका सुंदर पानाला पुन्हा अलगद स्पर्श करणं असतं.
‘आत्या’ हे नातं माहेरच्या अंगणातल्या त्या जुन्या, समृद्ध झाडासारखं असतं… ज्याच्या सावलीत आपण कधीतरी खेळलो होतो, ज्याच्या फांद्यांवर कधी झोका घेतला होता; आणि आयुष्याच्या उन्हात खूप पुढे आलो, तरी ज्याची शीतल सावली मनातून कधीच जात नाही… आत्या म्हणजे त्या सावलीचं मायेचं नाव!
आमच्या घराच्या शेजारच्या घरात आंबा आणि चिकू यांची मोठी झाडे आहेत. दोन्ही जवळ जवळ असल्याने एकमेकात मिसळून गेली आहेत. दोन्ही झाडे कायम हिरवीगार असतात. चिकू तर जास्तच, त्याची पानगळ कधी होते आणि नवीन पालवी कधी येते कळतच नाही. सहाजिकच असा वृक्षसंभार म्हणजे पक्षांचे आणि छोट्या सरपटणाऱ्या प्राण्यांचे निवासस्थान. आमच्या घराची खिडकी समोरच येते. त्यामुळे त्यांचे निरीक्षण करणे हा माझा छंद.
बरेच पक्षी झाडांना भेट देतात. कधी भारद्वाज आपल्या भारदस्त आवाजात साद घालतो. मला तो शाल पांगरलेल्या प्रौढ राजासारखा वाटतो. त्याच्या पाठीचा मखमली तांबूस रंग त्याला शोभून दिसतो. पांढऱ्या ठिपक्यांची साडी नेसलेली कोकिळा. आपल्या कर्कश आवाजात काळ्याभोर रंगाच्या, लाल डोळ्यांच्या, मंजुळ आवाजाच्या कोकिळाला साथ घालत असते. छोट्या सनबर्डची पळापळ अखंड सुरू असते. बारीकशी पिवळी चोच असणारी साळुंकी दबक्या पावलांनी वावरत असते. खारुताई खालीवर अखंड धावत असते. या झाडावरून त्या झाडावर उडी मारणे हा तिचा आवडता छंद. शेपटीच्या हलण्यावर आवाज करते, का आवाजाच्या तालावर शेपटी हरवते ते कळत नाही. मात्र दोन्ही क्रिया अखंड आणि एकदमच सुरू असतात, एवढे मात्र खरे. एक दोनदा दुर्मिळ शिक्रा व चष्मेवाला यांनीही दर्शन दिले. टिट, रॉबिन, पोपट, कावळा ही अधून मधून असतात. बुलबुलांचा बुलबुलाट अखंड सुरू असतो. तो विविध आवाजात ओरडतो. म्हणून मी त्याच्या ओरडण्याला बुलबुलाट म्हणते. एकदा आमच्या घराच्या खिडकीच्या ग्रीलवर त्याने घरटे केले. काड्या काड्याजमवून गोल वाटी तयार झाली. एक दिवस पाहिले तर जोडी ग्रील वर बसलेली. अंडी कधी घालतील याची आम्ही वाट पाहत होतो. पण कोणीच फिरकले नाही. घरटे खाली लोंबताना दिसले. बहुतेक महाराणींच्या पसंतीस महाल उतरला नाही. काय करणार. पण या पक्षाचे वैशिष्ट्य म्हणजे याच्या डोक्यावर टोपी असते. तपकिरी काळ्या रंगाचा, पांढरे पोट, रुंद चोच असलेला हा पक्षी गालावर दोन बाजूला लाल भडक रंगाचे डाग मिळवतो. शेपटीखालीही तसाच मोठा लाल टिपका असतो. समोरून पाहिला तर काळ्या शेंडीचा पांढर्या दाढीचा साधूच तो वाटतो. सगळे पक्षी मिळून काही वेळेला इतका कलकलाट करतात की पक्षांची शाळा भरली असावी.
या सर्वांपेक्षा माझे लक्ष वेधले ते नाचण किंवा नाचरा यानी(fantail). चिमणी सारखा छोटासा पक्षी, दहा-बारा सेंटीमीटर लांब, छोटीशी चपटी चोच आणि मातकट रंग. रंगाचे कोणतेही सौंदर्य नाही. पण एका जागेवर थांबली की शेपटीचा पिसारा फुलवते, तो पाहत राहावा. या पक्षाला स्थिरता नाही. अखंड पिसारा फुलवीत नाचत असतो. त्यामुळे नाव नाचण. मोराचे नृत्य भारदस्त व सौंदर्यवती नर्तकीच्या नृत्याची आठवण करून देते. तर नाचण तुरू तुरू चालणारी बारीक अशी छोटी बालिका. अखंड उत्साहाचा झराच. आता इथे दुसऱ्या क्षणी तेथे पसारा फुलवून तयार. या फुलवलेल्या पिसार्याची नागमोडी किनार त्याची शोभा वाढवते. मला उत्साह देणारी ही नाचण. अखंड घरात बसणारी मी. पण नाचण मला अखंड काहीतरी करायची उमेद देते. त्यामुळे मी काहीतरी लिहीत, वाचत राहते. म्हणूनच मला कार्य प्रवण करणाऱ्या या नाचणचे कौतुक.
‘अलका‘ म्हणजे अति लघु काव्य (Terribly Tiny Poetry)
**
सध्या ‘अलक’ या नावाचा एक अति लघु कथा प्रकार मराठी भाषेत तुरळकपणे दिसू लागलाय खरा, पण या वाङमय प्रकाराला कोणाचीही, कुठलीही अधिकृत मान्यता नाही. रसिक वाचकांकडूनही त्याला फारशी दाद मिळाल्याचे पाहण्यात नाही.
‘अलक’ किंवा ‘अति लघु कथा’ हा एक गद्य कथाप्रकार आहे. यात थोडक्या शब्दात एखादी, घटना, प्रसंग, विचार कथारूपात सांगण्याचा प्रयत्न केलेला असतो. या कथेचा जीवच मुळी लहान असतो. अलक हा क्षुद्र कथाप्रकार सामान्यतः समाज माध्यमांवर आढळून येतो. तो अधिक जागा व्यापत नाही.
यात पुन्हा दोन उपप्रकार आहेत, सकारात्मक व नकारात्मक. सकारात्मक अलक मध्ये वाचकावर सकारात्मक परिणाम साधण्याचा प्रयत्न असतो तर, नकारात्मक अलकमधे त्याउलट प्रयत्न दिसतो.
सध्या काही नवे हौशी लेखक काही तरी ‘हटके’ करायचे म्हणून आवर्जून, प्रयत्नपूर्वक अलक लिहून विविध समाजमाध्यमांवर प्रसारित करीत असतात. आतपुढ म्हणजे ‘आले तसे पुढे ढकलले’ ही तर माध्यमांची संस्कृती. त्यामुळे ह्या अलक विविध समूहांवर फिरत असतात हे सत्य आहे.
मराठी कथा, लघुकथा, दीर्घकथा ह्या कथा प्रकारांना प्रदीर्घ, प्राचीन परंपरा आहेत. त्या सर्वश्रुत व सर्वपरिचित आहेत. त्यांना समाजानेही मानले आहे, स्विकारले आहे. थोडक्यात हे कथाप्रकार मराठी जनमानसात ‘सुप्रतिष्ठित’ झाले आहेत.
लघु आणि दीर्घ कथा
लघुकथा ही आकाराने, लांबीने लहान असली तरी ती एक पूर्ण कथा असते. दीर्घ कथा सुद्धा एक परिपू्र्ण कथा असून ती आकाराने काहीशी विस्तृत असते. त्यातील व्यक्तिमत्वे, प्रसंग, तपशील, कालमर्यादा इ. बाबतीत तिचा आवाका मोठा असतो.
सध्याच्या अलक
अलक हे कथेचे लघुकथेपेक्षाही अधिक लघुरूप असते असे गृहित धरले तरी ती एक पूर्ण कथा असावी येवढी अपेक्षा आहे. त्यातील कथानकात काही नाट्य, एखादी व्यथा, एखादा संदेश असे काहीतरी असायला हवे. प्रत्यक्षात मात्र पूर्ण कथानक सामावणारी, वरील सर्व किंवा काही लक्षणे असणारी अलक आजपर्यंत तरी माझ्या वाचनात आलेली नाही.
वाचनात आलेल्या तथाकथित अलक या पूर्ण कथा कधीच वाटल्या नाहीत. एखादे वाक्य, दोन-चार वाक्यात मांडलेला एखादा विचार, एखादा प्रसंग येवढाच त्यांचा जीव असतो. त्याला कथा असे म्हणताच येत नाही.
काही तरी नवीन करण्याच्या हेतूने काही उत्साही मंडळींनी अलिकडे हा उथळ कथाबंध हाताळायला सुरुवात केली आहे. पण त्यात चमकदार, विस्मयकारी कल्पना, हळुवार अनुभूती, एखादा कलापूर्ण प्रतिभाविष्कार आहे असे काहीही अजून तरी वाचनात आलेले नाही.
अलका – चारोळी
गेल्या तीन-चार दशकापूर्वी अस्तित्वात आलेला हा एक उथळ काव्यप्रकार असला तरी बऱ्यापैकी लोकप्रिय होत आहे. विशेषतः यात तत्कालिक राजकीय व्यंगे मांडलेली असल्याने, काही चिमटे, कोपरखळ्या, टपला, चपेटे असल्यामुळे त्या त्वरित दाद घेऊन जातात. याअति लघु काव्याला आपण ‘अलका’ म्हणूया. अशा चारोळीत अगदी लहान कथाबीज, विचारबीज असते. त्या अगदी अल्पजीवी असतात.
अलका – हायकू
‘हायकू’ हा तीन ओळींचा काव्यप्रकार म्हणून हा ही ‘अलका’. हा जपानी भाषेत लोकमान्य झाला असला तरी प्रयत्न करूनही मराठीत तो कधीच रुजला नाही. शिरीष पै यांनी या काव्यप्रकारात काही लेखन केले आहे पण त्यांच्याखेरीज इतर साहित्यिकांनी त्याकडे दुर्लक्ष केल्याचे दिसते. प्रतिभावान कवियत्री शांता शेळके यांनी काही जपानी हायकूंचा मराठीत अनुवाद करून त्याचे ‘पाण्यावरील पाकळ्या’ नावाचे एक पुस्तक प्रकाशित केले आहे. पण असे काही तुरळक प्रयत्न सोडले तर हायकू मराठी मनाला आकर्षित करू शकले नाही हे वास्तव मान्य करावे लागेल.
अलका – सुभाषित
या पार्श्वभूमीवर संस्कृत वाङमयातील अत्यंत प्रभावी लोकप्रिय ‘सुभाषित’ ह्या लघुकाव्य – ‘अलका’ प्रकाराचा उल्लेख अटलनीय आहे.
जगातील भाषांमधील सर्वोत्कृष्ट भाषा ‘संस्कृत. ‘ त्यातील काव्य सर्वोत्तम आणि काव्यातही सर्वोत्कृष्ट प्रकार म्हणजे सुभाषित!
भाषासु मुख्या मधुरा दिव्या गीर्वाण-भारती।
तस्माद्धि काव्यम् मधुरं तस्मादपि सुभाषितम्॥
सुभाषिताची व्याख्या
मिताक्षरं हितं सभ्यं वैश्विकं सार्वकालिकम् ।
सालंकृतं स्वयंपूर्णं सुबोधं तत् सुभाषितम् ।।
कमीतकमी शब्दयुक्त, हितकारक, सभेत शोभून दिसेल असे, विश्वात सर्वत्र आणि सर्वकाळी लागू पडणारे, अलंकार-युक्त, अर्थाने परिपूर्ण आणि हे सर्व असुनही जे समजण्यास सोपे असते, त्याला ‘सुभाषित’ असे म्हणतात.
अलका – शायरी
उर्दू भाषेतील ‘शेरोशायरी’ हा ही असाच एक अति लघु काव्यप्रकार- अलका विलक्षण लोकप्रिय आहे. अँड. भाऊसाहेब पाटणकरांनी सिद्ध केलेला, बोली भाषेत लिहिलेला ‘मराठी शायरी’ हा काव्यप्रकार विलक्षण प्रभावी, परिणामकारक आहे. त्याची भाऊसाहेबांनी दार्शनिक पद्धतीने केलेली व्याख्या अशी…
भावोन्मादोत्थित कल्पनाचमत्काराविष्कार विशेषः शायरी। कल्पना चमत्कृतित्वंतु विस्मय सहकृत सदभिव्यंजकत्वम्।
उत्कट भावनेतून निर्माण झालेल्या सद्भिव्यंजक अशा विस्मयकारक कल्पनेच्या अविष्काराचे एक तंत्र असा मी वरील व्याखेचा सामान्यतः अर्थ लावतो.
दुर्दैवाने भाऊसाहेबांच्या या मराठी शायरीचा वारसा पुढे चालवणारा कोणी शायर लाभल्याचे आढळात नाही. परिणामी पूर्णतः सप्रमाण, सप्रात्यक्षिक सिद्ध करून सुद्धा भाऊसाहेबांच्या पश्चात मराठी शायरी अंकुरली, फोफावली नाही. तिची परंपरा निर्माण झाली नाही.
वरील वाङमय प्रकारांचा विचार करता सध्याच्या ‘अलक’ अगदीच पुचाट, बेंगरूळ, रसहीन, अर्थहीन वाटतात.
ज्यांना ‘अलक’ हा कथाप्रकार सोईचा वाटतो, प्रभावी वाटतो, आवडतो त्यांनी लिहावे. वाचकांनी आपापल्या क्षमतेप्रमाणे त्याचे रसग्रहण, मूल्यमापन करावे आणि ठरवावीत आपापली मते. अलकविषयी मी माझी ही व्यक्तिगत मते या निमित्ताने मांडतोय येवढेच.
☆ “अहिंसक आंदोलनाचे आणि सशस्त्र क्रांतिकारकांचे स्वातंत्र्यातील मोल…” ☆ श्री जगदीश काबरे ☆
“दे दी हमें आझादी बिना खड्ग बिना ढाल” हे गीत काव्यात्मक आणि राजकीय प्रतीक म्हणून महत्त्वाचे आहेच; मात्र त्यालाच फक्त स्वातंत्र्याचा इतिहास मानणे चुकीचे ठरेल. महात्मा गांधींच्या नेतृत्वाखालील असहकार, सविनय कायदेभंग आणि भारत छोडो आंदोलनांनी ब्रिटिश सत्तेला व्यापक आव्हान दिले होते. त्यांच्या आवाहनाला प्रतिसाद म्हणून लाखो सामान्य लोकांनी तुरुंगवास, लाठीमार, आर्थिक नुकसान आणि सामाजिक दडपशाही सहन केली. हे आंदोलन केवळ चरखा फिरवण्याचे आंदोलन नव्हते. मिठाचा सत्याग्रह, परदेशी मालावर बहिष्कार, कर न भरणे, संप, निदर्शने आणि ब्रिटिश प्रशासनाशी असहकार या सर्वांचा त्यात समावेश होता. त्यामुळे गांधीवादी संघर्षाचे प्रतीक म्हणून चरख्याचा उल्लेख करणे आणि संपूर्ण स्वातंत्र्यलढा चरख्यापुरता मर्यादित करणे यात मोठा फरक आहे हे आपल्यासारख्या सुज्ञ माणसांनी लक्षात ठेवले पाहिजे. त्याच वेळी, क्रांतिकारकांचे योगदान महात्मा गांधींनीही कधीच नाकारले नव्हते, हेही आपण लक्षात ठेवले पाहिजे. सशस्त्र क्रांतिवीरांचा संघर्ष भारतीय स्वातंत्र्याच्या इतिहासातील एक महत्त्वाचा अध्याय आहे. त्याचप्रमाणे आझाद हिंद सेनेचे प्रयत्न, १९४६ मधील रॉयल इंडियन नेव्ही उठाव आणि जालियनवाला बाग हत्याकांडानंतर निर्माण झालेला संताप यांनाही इतिहासाच्या व्यापक चौकटीत स्थान द्यावे लागते.
पण येथे एक महत्त्वाची राजकीय घडामोड लक्षात घेणे आवश्यक आहे. म्हणून ब्रिटिशांना क्रांतिकारकांच्या सशस्त्र संघर्षामुळेच भारत सोडावा लागला, असे म्हणणे अतिसुलभीकरण करणे होय. क्रांतिकारकांनी ब्रिटिश साम्राज्याला नैतिक, राजकीय आणि सुरक्षाविषयक आव्हान दिले, हे तर खरेच. त्यांच्या बलिदानाने तरुणांमध्ये राष्ट्रवादाची प्रेरणा निर्माण केली, हेही खरे. परंतु त्याच काळात दुसऱ्या महायुद्धानंतर ब्रिटनची आर्थिक व सामरिक परिस्थिती, भारतीय राजकीय जनमत, काँग्रेसचे व्यापक आंदोलन, मुस्लिम लीगचे राजकारण, सत्ता हस्तांतरणाची प्रक्रिया आणि ब्रिटिश साम्राज्याच्या बदललेल्या जागतिक परिस्थिती या सर्व घटकांचा विचार करावा लागतो. याहून महत्त्वाचे म्हणजे, रक्तरंजित इतिहास आणि अहिंसक इतिहास ही परस्परविरोधी विभागणीच चुकीची आहे. भारताचा स्वातंत्र्यलढा रक्तरंजितही होता आणि मोठ्या प्रमाणावर अहिंसकही होता. चौरी चौरा, जालियनवाला बाग, क्रांतिकारकांच्या फाशी, पोलिसांचा गोळीबार, तुरुंगातील अत्याचार आणि विविध उठाव हा त्याचा एक भाग आहे; तर सत्याग्रह, असहकार, बहिष्कार, उपोषणे, मोर्चे, जनआंदोलने आणि लाखो लोकांचा अहिंसक सहभाग हा दुसरा भाग आहे. एवंच एका प्रवाहाचे अस्तित्व मान्य करण्यासाठी दुसऱ्याला पुसून टाकण्याची गरज नाही. अन्यथा सेक्युलर विचारसरणी आणि हिंदुत्ववादी विचारसरणी यात फरक तो काय राहील?
म्हणूनच चरखा फिरवून स्वातंत्र्य मिळाले नाही, हे वाक्य अर्धसत्य आहे. कारण चरखा ब्रिटिश साम्राज्याचा पराभव करणारे शस्त्र नव्हता; तर तो आर्थिक स्वावलंबन, स्वदेशी आणि जनसहभागाचे प्रतीक होता. त्याचप्रमाणे भगतसिंगांची पिस्तूल किंवा आझाद हिंद सेनेची शस्त्रेही एकट्याने ब्रिटिश साम्राज्याचा पराभव करू शकली नाहीत. स्वातंत्र्य मिळवून देणारी शक्ती म्हणजे अनेक दशकांच्या विविध प्रकारच्या प्रतिकाराचा एकत्रित ऐतिहासिक परिणाम होता. म्हणून ध्वजारोहणाच्या वेळी एखादे गांधीवादी गीत वाजवले म्हणजे क्रांतिकारकांचा अपमान होतो, असे सरळ समीकरण मांडणे हे आपल्या देशभक्तीच्या विचाराला संकुचित करते. त्याऐवजी स्वातंत्र्यदिनाच्या कार्यक्रमात गांधी, भगतसिंग, सुभाषचंद्र बोस, राणी लक्ष्मीबाई, तात्या टोपे, सावरकर, टिळक, आझाद हिंद सेनेचे सैनिक, नौदल उठावातील सहभागी आणि असंख्य ज्ञात-अज्ञात स्वातंत्र्यसैनिक, या सर्वांच्या योगदानाची वस्तुनिष्ठ जाणीव ठेवणे अधिक योग्य ठरेल.
खरा इतिहास कोणत्याही एका महापुरुषाच्या किंवा एका विचारधारेच्या मालकीचा नसतो. भारताचे स्वातंत्र्य हे एका व्यक्तीचे कर्तृत्व नव्हते आणि एका विचार पद्धतीचेही फलित नव्हते; ते विविध विचारांचे, विविध संघर्षपद्धतींचे आणि असंख्य ज्ञात-अज्ञात भारतीयांच्या त्यागाचे संचित होते. म्हणून फक्त अहिंसेमुळे स्वातंत्र्य मिळाले, हे जसे अर्धसत्य आहे, तसेच फक्त सशस्त्र क्रांतीमुळे स्वातंत्र्य मिळाले, हेही अर्धसत्यच आहे. स्वातंत्र्याच्या इतिहासाला खरा न्याय द्यायचा असेल तर चरख्याबरोबर क्रांतिकारकांचे रक्त, सत्याग्रहाबरोबर तुरुंगवास, जनआंदोलनांबरोबर सशस्त्र उठाव आणि राजकीय वाटाघाटींबरोबर साम्राज्याच्या अंतर्गत झालेला दबाव, या सर्व घटनांना योग्य ऐतिहासिक संदर्भात पहावे लागेल. असे केले तरच एकांगी विचार न करता स्वातंत्र्याचा खरा अर्थ उमगेल आणि समजेल.