मराठी साहित्य – विविधा ☆  वृद्धावस्था…. एक जबाबदारी — लेखक – श्री अरुण पुराणिक ☆ प्रस्तुती – श्री अनंत केळकर ☆

🔅 विविधा 🔅

☆ वृद्धावस्था…. एक जबाबदारी — लेखक – श्री अरुण पुराणिक ☆ प्रस्तुती – श्री अनंत केळकर ☆

(आजी आजोबा दिना निमित्त)

मानव जेव्हा जन्माला येतो ती त्याच्या जीवनातली पहिली अवस्था आणि किनाऱ्याला आणते ती वृद्धावस्था. ही अवस्था सर्व अवस्था पार करून आलेली असते, त्यामुळे ती परिपक्व असते, असू शकते, असलीच पाहिजे.

एकेक क्षण मोलाचा

विचार करीत मी निघालो ।

आयुष्य सार्थकी होण्या

घडवीत मी निघालो ।।

माणसाचे कळतेपण वाढीस लागते तेव्हा आपण काय करावयास पाहिजे याचा प्रामाणिक विचार करू शकतो, आणि आणि मग जसजसं वय वाढत जाईल, तसा अनुभव संपन्न होऊन मार्गदर्शन करण्याइतपत येतो आणि तसंच ते झालं ही पाहिजे.

जीवनाचा उत्तरकाळ

मार्ग दाखविला अनुभवांचा ।

त्यातून घडला जीव

सार्थकी तो त्या क्षणांचा ।।

आपल्याकडून अनुभव संपन्न आयुष्याने एखादा उभरता जीव हा योग्य मार्गी होऊन यशोदायी जीवन जगला पाहिजे.

आपल्या अनुभव संपन्नेतून उभरदायी आयुष्य घडतांना, योग्य मार्ग दाखविणं हे वृद्धावस्थेतील महत्त्वाचे कार्य आहे. आपण किनारा गाठलेला असतो आणि त्यांना गाठावयाचा असतो. त्यामुळे त्यांना योग्य मार्ग दाखविणं ही त्यांची गरज असते. ती गरज भागविणं हे वृद्धांचे कार्य आहे.

कोणतेही काम म्हणजे पूजा असते, म्हणून ती विश्वासानेच झाली पाहिजे. जीवनावश्यक वस्तू आपणास लागतात, त्या विकत घ्याव्या लागतात म्हणून आधी खर्च करण्यापूर्वी मिळवायला शिकविले पाहीजे.

आपले विचार दुसऱ्या पर्यंत पोहोचविण्यासाठी लिहावं लागत, म्हणून लिहिण्यापूर्वी आपले विचार हे सुविचार कसे असतील ह्याचं मार्गदर्शन झालं पाहिजे.

आपण काय बोलावं, ते योग्य की अयोग्य? यासाठी अगोदर दुसऱ्याचे बोलणे ऐकावयास शिकले पाहिजे.

“प्रयत्ने वाळूचे कण रगडीता तेल ही गळे. ” ही म्हण आपणांस माहित आहे. त्यामुळे कोणत्याही गोष्टीत हार न स्विकारता प्रयत्नशील राहता आलं पाहिजे.

आपण जगतो ते कसं असलं पाहिजे, यासाठी मी एक गोष्ट सांगेन…

… समजा, मला कोणी २ रुपये दिले तर मी १ रुपयाचे काही खायला आणेन. ‘जगायचं म्हणून’ आणि दुसऱ्या रुपयाचं फुल आणेन ‘कसं जगावं?’ हे शिकवण्यासाठी.

आपण मनुष्य म्हणून जन्माला आल्यावर सर्वात बुद्धिमान म्हणून विचार करत असतो. तिचा उपयोग करता आला पाहिजे, हे सांगता आलं पाहिजे की, मरण्या अगोदर जगावयास शिका.

चुका करणे हा माणसाचा स्थायीभाव आहे. पण तीच चुक परत करू नका. चुक करतो तो माणूस, चुक सुधारतो तो देव माणूस, याचं ज्ञान दिलं पाहिजे.

“तारूण्य म्हणजे चुका,

प्रौढत्व म्हणजे लढा,

वृद्धत्व म्हणजे पश्चाताप. “

पण वृद्धत्व हा पश्चाताप व्हावा असं नको असेल तर…

… वृद्धावस्थेत मार्गदर्शक व्हा. जीवन आणि जीव घडवा आणि घडवित असतांना आपले शरीर स्वास्थ्य जर सांभाळले व पुरेसा आर्थिक स्तर स्वतःचा ठेवला तर वृद्धत्वाच्या समस्या येणार नाहीत आणि आल्या तरी त्या निवारता येतील.

आपल्या वर्तनानं ज्या गोष्टी शिकविल्या पाहिजेत, त्या म्हणजे “मान, दान आणि ज्ञान. “

मान देता आला पाहिजे, दान निरंतर केले पाहिजे आणि ज्ञान आपल्याकडे आहे ते दुसऱ्यास दिले पाहिजे.

हे सांभाळले तर वृद्धावस्था ही समस्या राहणार नाही आणि त्यामुळे तुम्ही किती जगलात? यापेक्षा कसे जगलात? याला जास्त महत्त्व असेल.

आयुष्यात अशा गोष्टी करू नका की, जेणेकरून झोपेचं कर्ज होईल आपल्यावर कारण त्यामुळे रक्तदाब, मधुमेह यासारखे भयानक त्रास आयुष्य उध्वस्त करतील.

म्हणून वृद्धावस्था ही स्वतःला जपण्याची व जपत असताना दुसऱ्यास अनुभव देणारी एक अवस्था आहे यावर विश्वास असला पाहिजे.

घरातील ज्येष्ठ व्यक्ती या नात्याने वावरत असतांना, ज्ञानाचा सूर्य, प्रेमाचा महासागर आणि शांतीचा हिमाचल असं आपलं स्थान असलं पाहिजे आणि ते आपण निर्माण करून आदराच्या स्थानी दिसलचं पाहिजे.

 House is built by bricks, but Home is built Hearts.

 हे वचन सिद्ध करणे ही ज्येष्ठ व वृद्ध म्हणून कर्तव्य आहे आणि ही वृद्धावस्थेतील सर्वात मोठी जबाबदारी आहे, हे लक्षात असलं पाहिजे. 🙏

लेखक : श्री अरुण पुराणिक

संग्राहक : अनंत केळकर

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ मतदान..काही आठवणी..भाग – १ – ☆ सुश्री विभावरी कुलकर्णी ☆

सुश्री विभावरी कुलकर्णी

🔅 विविधा 🔅

☆ मतदान..काही आठवणी..भाग – १ – ☆ सुश्री विभावरी कुलकर्णी ☆

मतदानाचे वारे वाहू लागले की या काही आठवणी हमखास येतातच. तसे आम्ही शिक्षक खूप भाग्यवान! कारण आम्हाला प्रत्यक्ष मतदान केंद्रावर जाऊन मतदान करण्याचे भाग्य सेवानिवृत्ती नंतरच मिळते. पूर्वी मतदान करण्याचे वय २१ होते. आणि बहुतेक शिक्षकांचे जॉब १८ किंवा १९ व्या वर्षी सुरू झालेले असतात. मी तर प्रथम मतदान अधिकारी म्हणून काम केले आणि नंतर मतदानाचे वय झाले. मग पोस्टल मतदान करावे लागे.

सुरुवातीच्या काळात संपूर्ण शाळेतील सगळे शिक्षक,शिपाई एकाच केंद्रावर असायचे. पण नंतर बरेच बदल झाले. आणि सगळे वेगवेगळ्या ठिकाणी नेमले जाऊ लागले. आणि आपली नेमणूक कोणत्या ठिकाणी असेल हे घरातील मंडळींना पण समजायचे नाही. एखाद्या गाडीत बसवून कामाच्या ठिकाणी नेले जायचे. तिथे गेल्यावरच कळायचे आपल्याला दोन दिवस इथे काम करायचे आहे. बरेचदा अती संवेदशील भागात काम करावे लागायचे. त्यातील एक आठवण…. आत्ता हसू येते. पण त्या वेळी जीवाचे पाणी होणे म्हणजे काय,किंवा पाचावर धारण बसणे या सारखे सगळे वाक्प्रचार व म्हणी आठवल्या होत्या.

असेच एका ठिकाणी नेऊन सोडले. कोणत्या भागात जायचे कोणालाच माहित नव्हते. दोन दिवस तर काम करायचे,कुठे कायमचे रहायचे आहे? या विचारात गेलो. प्रत्येक गोष्ट आनंदाने स्वीकारून काम करायचे अशी शिकवण. हे सतत लक्षात ठेवून गेलो. हळूच कोणीतरी म्हणाले अती संवेदनशील भाग आहे काळजी घ्या. एकंदर पोलिसांच्या जास्त असलेल्या गाड्या बघून हे लक्षात येऊन थोडी धाकधूक होतीच. पण कोणी काही न बोलता कामाला सुरुवात केली. आपापल्या जागी आसनस्थ झालो. आणि मतदान सुरू झाले. रांगा तर खूप मोठमोठ्या होत्या. अक्षरशः जागेवरून हलता पण येत नव्हते. साधारण तीन तास शांततेत पार पडले.आणि हळूहळू भीती कमी झाली.

तेवढ्यात आम्ही काम करत असलेल्या केंद्राच्या पत्र्यावर कोणीतरी उड्या मारत आहे असे जाणवले. मुले पतंग वगैरे काढत असतील असे वाटले. पण तितक्यात त्या पत्र्यातून हातात तलवार घेऊन धप्पकन उडी मारून एक व्यक्ती प्रगट झाली. आणि कोण रांगेत थांबवतो? बघतोच त्याच्याकडे… मला प्रथम मतदान करु द्या. असा आरडा ओरडा सुरु केला.  सगळे हादरून गेले. आणि त्याचा हा अवतार बघून आमचे वरिष्ठ अधिकारी अतिशय चपळतेने बाहेर पडले. ते बाहेर का गेले हे अद्याप कोडेच आहे. आणि शिपाई त्या रुमच्या बाहेर… मग आमचे कौशल्य कामी आले. पटकन दोन बोटे तोंडात घातली आणि शिट्टी मारली ( कधी नव्हे ती वेळेवर वाजली ) सगळे बघतच राहिले. पण ती शिट्टी ऐकून आमचे शिपाई व दोन हवालदार देवासारखे पटकन दाखल झाले आणि त्या तलवार धारी व्यक्तीला बाहेर नेले. आणि आम्ही सुटलो. आणि आता त्या आठवणीने हसत सुटतो.

ही वार्ता बाहेर गेल्यावर लगेच स्थानिक लोक तत्परतेने आले आणि काही काळजी करु नका असा धीर व पाणी,चहा देऊन गेले. त्यानंतर अधून मधून येऊन आमची विचारपूस करुन जात होते. एकच वेळी दोन अनुभव येत होते. अशा दोलायमान परिस्थितीत मतदान

संपे पर्यंत जीव मुठीत धरून काम केले. आणि रात्री नऊ नंतर आम्हाला पोलीस बंदोबस्तात तेथून बाहेर काढले.

एक अनुभव तर फार चटका लावणारा आहे. आपल्या केंद्रा  वरील टीमची शेवटच्या प्रशिक्षणाला ओळख होते. आणि एकमेकांचे नंबर घेतले जातात. असेच एका ट्रेनिंगच्या वेळी ओळखी झाल्या. आम्ही आपापल्या घरी निघालो. निम्म्या रस्त्यात आल्यावर आमच्या टीम मधील वरिष्ठ अधिकाऱ्यांचा फोन आला. फोन घेतला तर एक अनोळखी व्यक्ती बोलत होती. आणि त्या व्यक्तीने धक्का दायक बातमी सांगितली. “हा फोन ज्यांचा आहे,त्यांचा आत्ता अपघात झाला आहे व जागेवर मृत्यू झाला आहे. डायल नंबर मध्ये तुमचा शेवटचा नंबर होता म्हणून तुम्हाला फोन केला आहे.” आम्हाला तर त्यांची काहीच माहिती नव्हती. फक्त ऑफिस माहिती होते. मग तिकडून त्यांच्या इतर सहकाऱ्यांचा नंबर घेऊन त्यांना कळवले.

असे अनेक भले बुरे अनुभव येतात. नवीन ओळखी होतात.

अशा प्रत्येक वेळच्या निरनिराळ्या आठवणी निवडणूक तयारी सुरू झाली की मनात दाटून येतात. आता मात्र मुक्तपणे मतदान केंद्रावर जाऊन मतदानाचा आनंद घेते. आता तर केंद्राच्या बाहेर बऱ्याच ठिकाणी सेल्फी पॉइंट्स ठेवतात. मग काय छान कृत्रिम महिरपीत उभे रहायचे आणि शाई लावलेले बोट ( या फोटोत ते महत्वाचे असते ) समोर धरुन सेल्फी ( दुसऱ्याने काढलेला) घ्यायचा आणि फेसबुक,whatsapp आणि इतर मीडियावर पोस्टून टाकायचे. आणि आम्ही किती कर्तव्यदक्ष आहोत मिरवायचे.

© सुश्री विभावरी कुलकर्णी

मेडिटेशन,हिलिंग मास्टर व समुपदेशक.

सांगवी, पुणे

📱 – ८०८७८१०१९७

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ तो आणि मी…! – भाग ४ ☆ श्री अरविंद लिमये ☆

श्री अरविंद लिमये

? विविधा ?

☆ तो आणि मी…! – भाग ४ ☆ श्री अरविंद लिमये ☆

(पूर्वसूत्र – “नाही वहिनी. आम्ही आणि डॉक्टरांनी काहीच केलेले नाही. आम्ही फक्त निमित्त होतो. बाळ वाचलंच नाहीय फक्त तर ते ‘वर’ जाऊन परत आलंय.” लेले काका सांगत होते,”आत्ता पहाटे आम्ही इथे आलो ते मनावर दगड ठेवून पुढचं सगळं अभद्र निस्तरण्याच्या तयारीनेच आणि इथे येऊन पहातो तर हे आक्रित! दादा, तुम्हा दोघांच्या महाराजांवरील अतूट श्रद्धेमुळेच या चमत्कार घडलाय.बाळ परत आलंय.”

या आणि अशा अनेक अनुभवांचे मनावर उमटलेले अमिट ठसे बरोबर घेऊनच मी लहानाचा मोठा झालोय.सोबत ‘तो’ होताच…!)

पुढे तीन वर्षांनी बाबांची कुरुंदवाडहून किर्लोस्करवाडीला बदली झाली ते १९५९ साल होतं. कुरुंदवाड सोडण्यापूर्वी आई न् बाबा दोघेही नृसिंहवाडीला दर्शनासाठी गेले.आता नित्य दर्शनाला येणं यापुढे जमणार नाही याची रुखरुख दोघांच्याही मनात होतीच. आईने दर पौर्णिमेला  वाडीला दर्शनाला येण्याचा संकल्प मनोमन सोडून ‘माझ्या हातून सेवा घडू दे’ अशी प्रार्थना केली आणि प्रस्थान ठेवलं!

किर्लोस्करवाडीला पोस्टातल्या कामाचं ओझं कुरुंदवाडपेक्षाही कितीतरी पटीने जास्त होतं.पूर्वी घरोघरी फोन नसायचे.त्यामुळे ‘फोन’ व ‘तार’ सेवा पोस्टखात्यामार्फत २४ तास पुरवली जायची.त्यासाठी पोस्टलस्टाफला दैनंदिन कामांव्यतिरिक्त जादा

रात्रपाळीच्या ड्युटीजनाही जावे लागायचे. त्याचे किरकोळ कां असेनात पण जास्तीचे पैसे मिळायचे खरे, पण ती बिले पास होऊन पैसे हातात पडायला मधे तीन-चार महिने तरी जायचेच. इथे येऊन बाबा अशा प्रचंड कामाच्या दुष्टचक्रात अडकून पडले.त्यांना शांतपणे वेळेवर दोन घास खाण्याइतकीही उसंत नसायची. दर पौर्णिमेला नृसिंहवाडीला दत्तदर्शनासाठी जायचा आईचा नेम प्रत्येकवेळी तिची कसोटी बघत सुरू राहिला होता एवढंच काय ते समाधान. पण तरीही मनोमन जुळलेलं अनुसंधान अशा व्यस्ततेतही बाबांनी त्यांच्यापध्दतीने मनापासून जपलं होतं. किर्लोस्करवाडीजवळच असलेल्या रामानंदनगरच्या आपटे मळ्यातल्या दत्तमंदिरातले नित्य दर्शन आणि सततचे नामस्मरण हा त्यांचा नित्यनेम.कधीकधी घरी परत यायला कितीही उशीर झाला तरी त्यांनी यात कधीही खंड पडून दिला नव्हता!

मात्र बाबांच्या व्यस्ततेमुळे घरची देवपूजा मात्र रोज आईच करायची. माझा धाकटा भाऊ अजून लहान असला तरी त्याच्यावरच्या आम्हा दोन्ही मोठ्या भावांच्या मुंजी नुकत्याच झालेल्या होत्या. पण तरीही आईने पूजाअर्चा वगैरे बाबीत आम्हा मुलांना अडकवलेलं नव्हतं. या पार्श्वभूमीवरचा एक प्रसंग…

पोस्टलस्टाफला किर्लोस्कर कॉलनीत रहायला क्वार्टर्स असायच्या. आमचं घर बैठं,कौलारू व सर्व सोयींनी युक्त असं होतं. मागंपुढं अंगण, फुलाफळांची भरपूर झाडं, असं खऱ्या ऐश्वर्यानं परिपूर्ण! आम्ही तिथे रहायला गेलो तेव्हा घरात अर्थातच साधी जमिनच होती. पण कंपनीतर्फे अशा सर्वच घरांमधे शहाबादी फरशा बसवायचं काम लवकरच सुरू होणार होतं. त्यानुसार आमच्याही अंगणात भिंतीना टेकवून शहाबादी फरशांच्या रांगा रचल्या गेल्या.

त्याच दिवशी देवपूजा करताना आईच्या लक्षात आलं की आज पूजेत नेहमीच्या दत्ताच्या पादुका दिसत नाहीत. देवघरात बोटांच्या पेराएवढ्या दोन चांदीच्या पादुका होत्या आणि आज त्या अशा अचानक गायब झालेल्या!आई चरकली.अशा जातील कुठ़ न् कशा?तिला कांहीं सुचेचना.ती अस्वस्थ झाली. तिने कशीबशी पूजा आवरली. पुढची स्वयंपाकाची सगळी कामंही सवयीने करीत राहिली पण त्या कुठल्याच कामात तिचं मन नव्हतंच. मनात विचार होते फक्त हरवलेल्या पादुकांचे!

खरंतर घरी इतक्या आतपर्यंत बाहेरच्या कुणाची कधीच ये-जा नसायची. पूर्वीच्या सामान्य कुटुंबात कामाला बायका कुठून असणार?

धुण्याभांड्यांसकट सगळीच कामं आईच करायची. त्यामुळे बाहेरचं कुणी घरात आतपर्यंत यायचा प्रश्नच नव्हता. आईने इथं तिथं खूप शोधलं पण पादुका मिळाल्याच नाहीत.

बाबा पोस्टातून दुपारी घरी जेवायला आले. त्यांचं जेवण पूर्ण होईपर्यंत आई गप्पगप्पच होती. नंतर मात्र तिने लगेच ही गोष्ट बाबांच्या कानावर घातली.ऐकून बाबांनाही आश्चर्य वाटलं.

“अशा कशा हरवतील?”

“तेच तर”

“सगळीकडे नीट शोधलंस का?”

“हो..पण नाही मिळाल्या”

आई रडवेली होऊन गेली.

“नशीब, अजून फरशा बसवायला गवंडीमाणसं आलेली नाहीत.”

“त्यांचं काय..?”

“एरवी त्या गरीब माणसांवरही आपल्या मनात कां होईना पण आपण संशय घेतलाच असता..”

त्या अस्वस्थ मनस्थितीतही बाबांच्या मनात हा विचार यावा याचं त्या बालवयात मला काहीच वाटलं नव्हतं,पण आज मात्र या गोष्टीचं खूप अप्रूप वाटतंय!

नेमके त्याच दिवशी गवंडी आणि मजूर घरी आले. पूर्वतयारी म्हणून त्यांनी जमीन उकरायला सुरुवात केली. त्यानिमित्ताने घरातले सगळे कानेकोपरेही उकलले गेले. पण तिथेही कुठेच पादुका सापडल्या नाहीत. पूजा झाल्यानंतर आई ताम्हणातलं तीर्थ रोज समोरच्या अंगणातल्या फुलझाडांना घालायची. ताम्हणात चुकून राहिल्या असतील तर त्या पादुका त्या पाण्याबरोबर झाडात गेल्या असायची शक्यता गृहीत धरून त्या फुलझाडांच्या भोवतालची माती खोलवर उकरून तिथेही शोध घेतला गेला पण पादुका मिळाल्याच नाहीत.

मग मात्र आईसारखेच बाबाही अस्वस्थ झाले. नेहमीप्रमाणं रोजचं रुटीन सुरू झालं तरी बाबांच्या मनाला स्वस्थता नव्हतीच.कुणाकडूनतरी  बाबांना समजलं की जवळच असणाऱ्या पलूस या गावातील सावकार परांजपे यांच्या कुटु़ंबातले एक गृहस्थ आहेत जे पूर्णपणे दृष्टीहीन आहेत.ते केवळ अंत:प्रेरणेने हरवलेल्या वस्तूंचा माग अचूक सांगतात अशी त्यांची ख्याती आहे म्हणे.बाबांच्या दृष्टीने हा एकमेव आशेचा किरण होता! बाबा स्वत: त्यांनाही जाऊन भेटले. आपलं गाऱ्हाणं आणि मनातली रूखरूख त्यांच्या कानावर घातली. त्यांनीही आपुलकीने सगळं ऐकून घेतलं. काहीवेळ अंतर्मुख होऊन बसून राहिले.तोवरच्या त्यांच्या चेहऱ्यावरच्या शांतपणाची  जागा हळूहळू काहीशा अस्वस्थपणानं घेतलीय असं बाबांना जाणवलं. त्यांची अंध,अधूदृष्टी क्षणभर समोर शून्यात स्थिरावली आणि ते अचानक बोलू लागले.बोलले मोजकेच पण अगदी नेमके शब्द!

“घरी देवपूजा कोण करतं?” त्यांनी विचारलं.

“आमची मंडळीच करतात”

बाबांनी खरं ते सांगून टाकलं.

” तरीच..”

“म्हणजे?”

” संन्याशाची पाद्यपूजा स्त्रियांनी करून कसं चालेल?”

“हो पण.., म्हणून..”

” हे पहा ” त्यांनी बाबांना मधेच थांबवलं.” मनी विषाद नको, आणि यापुढे हरवलेल्या त्या पादुकांचा शोधही नको. त्या कधीच परत मिळणार नाहीत.”

” म्हणजे..?”

” त्या हरवलेल्या नाहीयत. त्या गाणगापूरच्या पादुकांमध्ये विलीन झालेल्या आहेत.”

बाबांच्या मनातली अस्वस्थता अधिकच वाढली.कामात मनच लागेना ‘घडलेल्या अपराधाची एवढी मोठी शिक्षा नको’ असं आई-बाबा हात जोडून रोज प्रार्थना करीत विनवत राहिले.भोवतालच्या मिट्ट काळोखातही मनातला श्रध्देचा धागा बाबांनी घट्ट धरुन ठेवला होता. कांहीही करून हरवलेल्या त्या पादुका घरी परत याव्यात एवढीच त्यांची इच्छा होती पण ती फरुद्रूप होण्यासाठी कांहीतरी चमत्कार होणं आवश्यक होतं!आणि एक दिवस अचानक……?

क्रमश: दर गुरुवारी

©️ अरविंद लिमये

सांगली (९८२३७३८२८८)

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ चैत्रांगण… ☆ सुश्री मानसी चिटणीस ☆

सुश्री मानसी विजय चिटणीस

? विविधा ?

☆ “चैत्रांगण…” ☆ सुश्री मानसी विजय चिटणीस

चैत्र शुक्ल तृतीयेपासून चैत्रगौर म्हणजे अन्नपूर्णा आसनावर किंवा झोक्यावर बसवली जाते. रेशमी वस्त्रे, मोगरीची फुलं, चंदनगंधाचे विलेपन यांनी तिला सजवले जाते..माहेरपणाला आलेली लाडाची लेकच जणू.. त्या झोक्यात बसलेल्या गौरीला पाहून मला इंदिराबाईंची, ‘आली माहेरपणाला’ ही कविता आठवते नेहमी..

               “आली माहेरपणाला

                 आणा शेवंतीची वेणी

                 पाचू मरव्याचे तुरे

                 जरी कुसर देखणी “

सासरी राबून थकलेल्या लेकीला विसाव्याचे चार क्षण मिळावेत, तिला आनंद व्हावा, तिच्या चेहऱ्यावर हसू फुलावे म्हणून आईची कोण धडपड..लेक माहेरपणाला आलीय, कुठे तिच्यासाठी शेवंतीची वेणी कर, कुठे तिच्या पोलक्यावर पाचू जडव तर तिला सुगंध आवडतो म्हणून तिच्यासाठी मरव्याचे अत्तर बनव..आईची ही सारी धडपड संसारीक वैशाखाने रणरणलेल्या लेकीच्या मनाला थोडा तरी गारवा मिळावा..

चैत्र, चांद्रवर्षाचा पहिला महिना. या महिन्यातल्या पौर्णिमेच्या आसपास चित्रा नक्षत्र अवकाशात असते म्हणून हा चैत्र महिना. ऋतूराज वसंताचा लाडका महिना..आणि म्हणूनच या काळात येणाऱ्या नव्या तांबूस पोपटी पालवीला चैत्रपालवी म्हणतात. साऱ्या सृष्टीचे सृजन या काळात होते. म्हणूनच आदिशक्ती आणि शिव या सृष्टीच्या उगमकर्त्यांचे पूजन या महिन्यात करण्याचा प्रघात पडला असावा. भारतात अनेक ठिकाणी या काळात गणगौरी पुजन युवती आणि विवाहित स्त्रीया करतात. आपल्या घरी हळदीकुंकू करतात. मनाला आणि शरीराला गारवा देणारे मोगरीची फुले, ओले हरभरे, विड्याचे पान-सुपारी, कलिंगड, आंंब्याची डाळ आणि पन्हे यांचे वाण दिले जाते. या हळदीकुंकवाच्या निमित्ताने माय-लेकी, बहिणी-बहिणी, मैत्रीणी एकमेकांना भेटतात..एकमेकींची सुखदुःख निगूतीने ऐकतात..त्यावर फुंकर घालताना आपल्या डोळ्यांतील पाणी लपवतात.

मला आठवतंय..लहानपणी, जेव्हा गौरीला झोक्यात बसवलं जायचं तेव्हा मी ही आईकडे झोक्यासाठी, गौरीसारखं नटवण्यासाठी हट्ट करायचे तेव्हा कधी आई गालातल्या गालात हसायची तर कधी डोळ्यांत पाणी आणायची. आज तिच्या त्या वागण्याचा अर्थ कळतोय. स्त्रीचे भावविश्व अशा सणवार व्रतवैकल्य यांच्याशी जोडलं गेलयं. चैत्रगौर ही सृजनदेवता आणि स्त्री देखील..हे मांडलं जाणारं चैत्रांगण किंवा हळदीकुंकू हे याच सृजनाचं संक्रमण असावं. एका उर्जेचा एकीकडून दुसरीकडे चालणारा प्रवास असावा. चैत्र हा ही सृजनसखाच..तर चैत्र शुद्ध प्रतिपदेपासून सुरू होणाऱ्या चैत्र महिन्यात अंगणात; मग ते अंगण ग्रामिण असो की शहरी.. चैत्रांगण रेखाटले जाते. ६४ शुभचिह्नांनी युक्त अशा या रांगोळीत चैत्रगौर, तिचे पती शंभू महादेव, तिचे सौभाग्यालंकार, मोरपीस, बासरी, ती जगत्जननी असल्याने सूर्य चंद्रापासून साप-हत्तीपर्यंतचा तिचा संसार रेखला जातो. तिची पावले, तिच्या अस्तित्वाचे प्रतिक असलेले स्वस्तिक आणि तिचे आवडते कमळ, तिच्या पुजेसाठीचे शंख, घंटा, ध्वज असे सारे ऐवज रेखले जातात. ते चैत्रांगण बघताना वाटते की कुणा चिमुकलीची भातुकलीच मांडली आहे की काय? या साऱ्या रांगोळीचे रेखाटन चैत्र महिना संपेपर्यंत केले जाते.

माहेरपणाला आलेल्या गौरीला पाळण्यात बसवले जाते. पाळण्यात बसवण्यापूर्वी देवीच्या मुर्तीला अंघोळ घालून, पूजा-अर्चा करून नैवेद्य दाखविला जातो. फुलांची सजावट केली जाते. देवीसमोर वेगवेगळे पदार्थ, देखावे यांची आरास मांडली जाते. खिरापत म्हणून सुके खोबरे व साखर दिली जाते. छोट्या तांब्यात देवीसाठी पाणी भरून ठेवले जाते.बत्तासे, कलिंगड, काकडी, कैरीची डाळ, भिजवलेले हरभरे, पन्हे आदी पदार्थ देवीसाठी केले जातात व नंतर हळदी कुंकू करून वाण म्हणून दिले जातात. सुगीच्या हंगामात केल्या जाणाऱ्या या व्रतात आपली मुले-बाळे, घर-दार यांच्या सुखसमृद्धी ची मनोकामना केली जाते.

अशा या माहेरपणासाठी आलेल्या लेकीचे कौतुक करण्यासोबतच सृजनाचीही पूजा केली जाते. लेकीचे कोडकौतुक करताना लेकीने आईपासून लपवलेले अश्रू असोत की मनातले सल.. चैत्रांगण टिपतेच असे स्त्रीभावनांचे गूढ पदर..

डोळ्यांत आसू अन् ओठांवर हसू

सुखाच्या ओंजळीत दुःखाचे पसू…

या आणि अशा अनेक झळांवर गारव्याचे लिंपण म्हणून तर झोक्यातले झुलणे आणि चैत्रातले रेखाटन असेल का?

चैत्रांगण

© सुश्री मानसी विजय चिटणीस

केशवनगर, चिंचवड, पुणे. फोन : ०२०२७६१२५३१ / ९८८११३२४०७

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ चैत्र… ☆ डाॅ.व्यंकटेश जंबगी ☆

डाॅ. व्यंकटेश जंबगी

?  विविधा ?

☆ चैत्र… ☆ डाॅ.व्यंकटेश जंबगी ☆

वसंत, किती वसंत येऊन गेले जीवनात रमून जातो आपण आठवणीत किती सांगू माझ्या वसंताचे ऋण फुलवितो जीवन मोगर्यासमान आठवती बालपणीची गाणी….

“सुखावतो मधुमास हा…”

“आला वसंत येथे मज ठाऊकेच नाही…”

“आला वसंत ऋतू आला….”

“कुहू कुहू बोले कोयलिया….”

“कोयलिया बोले अंबुवा डालपर ऋतू बसंतकी देत संदेसवा..”

वसंत, कोकिळ,आम्र आणि उन्हाळ्याची सुट्टी यांचं नातं आंब्यासारखं…आभ्यासाच्या साली काढून सुट्टीच्या गराचा आस्वाद घ्यायचा.. नव्या वर्गात जाण्यासाठी कोय पेरायची….

आठवतात का…..

काचाकवड्या,कैरम,गोट्या,पत्ते पोहणे.. सायकलवर काम फत्ते.

आमच्या चकार्या ज्येष्ठांच्या चकाट्या..पिट पिट पिटायच्या.

आठवतात का ते दिवस….

मामा,काका, मावशी, आत्या त्येकाची मुलं पाच…

भल्या मोठ्या मामाच्या वाड्यात फक्त धुडगूस आणि नाच….

आठवतात का, गाण्याच्या भेंड्या  सारे आजोबा उडवायचे शेंड्या..

आठवतात का फणस, त्याच्या भाजलेल्या बीया, चुलीत हात घालून बाहेर सुखरूप काढणार्या आजीची किमया.

आठवतात का, मोठे झालो.. किती वसंत जीवनात आले ? 

वसंतराव देशपांडे,वसंत देसाई, एकाचे गाणे एकाची सनई वपुतल्या वसंताने किमया केल्या आजी स्टाईलने कथा सांगितल्या.

वसंत बापटांच्या कविता अजून रेंगाळतात मनाच्या कोपऱ्यातून चांदोबा चंपक साथ सोडून गेले मोबाईलची “साथ” लावून गेले.

सगळे “वसंत” वाचनालयी राहिले गुपचुप कपाटात नंबराने थांबले.

आजी झाली कार्टून,काका झाले यूट्यूब, आजोबा झाले गुगल मामा आत्याची दांडी गुल.

असाच परवा  “वसंत” भेटला.

“ओळखलस का ?” म्हणाला.

मी बालपणात घेऊन गेलो त्याला गळ्यात पडून ढसढसा रडला.  मी म्हणालो “झालं काय?”

म्हणतो,”अजून शिशीरच आहे रे.

मामाचा वाडा ओस आहे.

आंब्याचे झाड उदास आहे.

कैर्यांच्या फोडी भेळेत खातात, माझ्या कैर्या तशाच राहतात.

आता मी “वसंत”नाही “समर”

आहे, फक्त पंचांगापुरता अमर आहे.कोकिळ गात नाही आता फक्त रडतो आहे,पंचम आता वाद्यांच्या गोंगाटात लुप्त आहे.”

माझेही डोळे पाणावले,म्हणालो “वसंता,जरा धीर धर.तुझ्याही जीवनात “वसंत”येईल..!”

“खरच?”डोळे पुसत वसंत म्हणाला..मी म्हणालो,”हां,हां शिशीर आया है,तो वसंतके आनेमें देर कहां?”

वसंत तोच आहे,सृष्टी बदलत नाही,माणसाची द्रुष्टी बदलते त्याला इलाज नाही!

© डॉ. व्यंकटेश जंबगी

एफ-३, कौशल अपार्टमेंट, श्रीरामनगर, ५ वी गल्ली, सांगली – ४१६ ४१४
मो ९९७५६००८८७

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ संकल्पाचा दिवस… ☆ सौ कल्याणी केळकर बापट ☆

सौ कल्याणी केळकर बापट

? विविधा ?

संकल्पाचा दिवस☆ सौ कल्याणी केळकर बापट

खरंतरं नववर्षाच्या दिवसाचे वेध हे दोनतीन दिवसा आधीपासूनच लागतात आणि त्याची साग्रसंगीत तयारी सुद्धा करावी लागते.कारण  हा  दिवसच मुळी खूप महत्वाचा, आनंदाचा आणि मांगल्याचा.

चैत्र शुद्ध प्रतिपदा.गुढीपाडवा. हिंदू नववर्षाची सुरवात. वर्षाचा  पहिलाच दिवस. येते वर्ष आपणा सगळ्यांना निरामय आरोग्याचे, सुखाचे आणि भरभराटीचे जावो हीच श्रीराम चरणी प्रार्थना.

आमच्याकडे खेड्यावर श्रीरामाचं नवरात्र असतं.गावी बापटांचं श्रीराममंदिर आहे.ह्या दिवशी सकाळपासूनच मंगलमय,प्रसन्न असं वातावरण असतं.अगदी भल्या पहाटे पाच वाजता रांगोळ्या रेखाटून, तोरणं लावून गुढीचे स्वागत करायला सगळा गाव सज्ज होतो.गुढी उभारणीचा मुहूर्त अगदी सुर्योदयाचा.गुढीला ल्यायला काठापदराचे नवीन वस्त्र, हार,बत्तासे गाठ्या,कडुलिंबाच्या डहाळ्या,आंब्याची पाने इ. नी गुढी सजवायची.त्यावर कलश पालथा घालून गुढी सजवून ती उंच उभारायची.

गुढी म्हणजे सौख्याचे,मांगल्याचे प्रतीक. खरचं असे सणवार आपण साग्रसंगीत घरी केलेत तरच हा वसा पुढील पिढीपर्यंत पोहोचेल.

आजकाल बहुतांश गावांमध्ये होणारा एक दर्जेदार सांस्कृतिक कार्यक्रम” पाडवापहाट “बघण्यास जाण्याचा योग ह्या घरच्या पुजेमुळे येत नाही. कारण सगळ्यात जास्त आपल्या घरची गुढी उभारणं, तिचं व्यवस्थित पूजन करुन नैवेद्य दाखविणं. आणि हा चांगला वसा जर पुढील पिढीपर्यंत संक्रमित करायचा असेल तर आधी तो आपण जपून दाखविला पाहिजे.

मागे दोन वर्षांपासून कोरोनामुळे सगळे सामुहिक धार्मिक कार्यक्रम, एकत्रितपणे साजरे केल्या जाणारे सणसमारंभ ह्यावर जरा अंकुशच आला होता. आता जरा मोकळं झाल्यासारखं वाटतं.

आता गुढीपाडवा ,नववर्षाचा पहिला दिवस,निदान ह्या दिवसाची सुरवात अगदी स्वतःबद्दलची एकतरी खरीखुरी गोष्ट सांगुन करावी ह्या उद्देशाने सांगते गुढीपाडवा हा माझ्यासाठी  आणखी एका कारणासाठी खूप महत्त्वाचा दिवस. असे कित्येक गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर मी काही तरी स्वतःमध्ये चांगले बदल,स्वतःला चांगल्या सवयी लावून करते पण खरी गोम अशी की हे संकल्प रामनवमी पर्यंत सुरळीत बिनबोभाट कटाक्षाने नियमित सुरू राहतात आणि मग एकदा का रामनवमी झाली की परत ये रे माझ्या मागल्या नुसार माझी संकल्पांची एस. टी. गचके खात थांबते.पण एक नक्की दर गुढीपाडव्याला संकल्प ठरवायचा आणि तो काही दिवस सुरू ठेवायचा हा शिरस्ता काही माझ्याकडून कधीच मोडला जात नाही हे पण खरे.

पोस्टची ची सांगता माझ्याच एका जुन्या रचनेने पुढीलप्रमाणे

*

वसंतऋतूच्या आगमनाने तरवरतोय,

अवनीवरील कण न कण,

त्यानेच प्रफुल्लित झाले मन,

कारण हिंदू वर्षातील आज पहिलाच सण ।।

*

गुढीपाडवा म्हणजे अनुपम सोहळा,

सुरू होतयं आनंदाचं  सत्र,

कारण ह्याच दिवसापासून सुरू होतयं,

आमच्या रामराजाच़ नवरात्र, ।।

*

आमच्या ह्या सणाचा आनंद

काही औरच आणि निराळा,

सुर्योदयावेळी गुढी उभारणे ,

हा एक अनुपम सोहळा  ।।    

*

रावणाविरुध्ज विजयश्री मिळविली रामाने

धरुन सत्याचे शस्त्र,

मांगल्याची गुढी सजली,

लेवून कोरे करकरीत वस्त्र,

गुढीचे सौंदर्य खुलते गाठीबत्तासे व

कडूलिंबाच्या तोरणाने,

निरामय आरोग्याची सुरवात होते.

ह्या सगळ्याच्या सेवनाने ।।।

*

गुढीपाडव्याचा कलश असतो,

प्रतीक मांगल्याचे,

ह्या सणाच्या आगमनाने

लाभतात क्षण सौख्याचे,

असा हा सण न्यारा गुढीपाडवा,

रामनामातच एकवटलाय सारा गोडवा ।।

*

चैत्रशुद्धप्रतिपदेच्या म्हणजेच  

गुढीपाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा ।।।

नवीन वर्ष आनंदाचे,सौख्याचे, निरामय आरोग्याचे,भरभराटीचे जावो हीच रामराया जवळ प्रार्थना.

©  सौ.कल्याणी केळकर बापट

9604947256

बडनेरा, अमरावती

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ इंद्रधनुष्य – गमती जमती ☆ सौ. मंजिरी येडूरकर ☆

सुश्री मंजिरी येडूरकर

?  विविधा ?

इंद्रधनुष्य – गमती जमती ☆ सौ.मंजिरी येडूरकर ☆

पाऊस पडून गेला कि सगळी सृष्टी आनंदी होते. धरती हिरवीगार होते, रंगीबेरंगी फुलं माळते. रंग आणि गंध यांची मुक्त उधळण करते. रंगीबेरंगी फुलापाखरं फुलांवर रुंजी घालतात.पक्षी, गाणी गात स्वछंद विहार करतात. या सगळ्या आनंदात आकाश कां मागे राहील. त्याला तर ढगांच्या जोखडातून मुक्त झाल्याचा केवढा आनंद होतो, मग तो ही इंद्रधनुची सप्तरंगी कमान उभी करतो. हे सारं पहायला मिळणार म्हणून तर आपण आज हा सूर्याचा दाह मुकाट सहन करतोय. होय नां!

आज अर्थात आपला पाऊस हा विषय नाही. आज इंद्रधनुष्य, ही जी निसर्गाची किमया आहे त्याबद्दलच्या काही गमती पहायच्या आहेत. खरं म्हणजे ह्या गमती निर्माण करण्यात निसर्गाचा जेवढा वाटा आहे तेवढाच आपल्या ज्ञान – चक्षुंचा आहे. म्हणजे डोळ्यांना काय पहायचं, कसं पहायचं, ह्याचं ज्ञान देणारा  मेंदूचा भाग. जसं  आकाश नावाची वस्तू कुणी वर अंथरलेली नाही, की त्याला कुणी निळा रंग दिलेला नाही. तसंच इंद्रधनुष्य म्हणजे कुणी कमान उभी केलेली नाही कि रंगाचे पट्टे मारलेले नाहीत. हे सगळे आपल्या डोळ्यांनी निर्माण केलेले आभास आहेत. आणि ते खरे मानून आपण त्यात रमतो. म्हणजे कल्पनेत रमण्याची मक्तेदारी कांही फक्त कवींची नाही, आपली पण आहे.

त्या सप्तरंगी कमानीला इंद्रधनुष्य म्हणतात कारण ती कमान धनुष्याच्या आकाराची आहे. त्या कमानीवरून मधल्या उंच टोकावर गेलं कि स्वर्गाचं दार दिसतं. आपल्या नशीबानं जर ते उघडलं तर इंद्राचा दरबार दिसतो, म्हणून इंद्राकडे म्हणजेच स्वर्गाकडे जायचा मार्ग सोपा करणारं म्हणून इंदधनुष्य ! फक्त आपल्या कडंच नाही हं, सगळ्या देशात अशा इंद्रधनुष्याशी संबधित गमतीदार कथा आहेत.

पुढच्या गमती पहाण्यासाठी अगदी प्राथमिक शास्त्रीय माहिती घेऊया. पाऊस पडून गेल्यावर हवेत असणाऱ्या पाण्याच्या थेंबातून जर 42 अंशाचा कोन करून प्रकाश किरण गेला तर त्या किरणाचे थेंबात जाताना व बाहेर पडताना असे दोनदा अपवर्तन होते. किरणाची दिशा बदलते व त्याचे सात रंगात पृथ:करण होते. ही क्रिया एकाच वेळी करोडो थेंबात होते कारण तेथे प्रकाश किरण सुद्धा करोडो असतात.थेंब गोल आकाराचे असल्यामुळे गोल आकाराचा रंगीत पट्टा म्हणजे गोल इंद्रधनुष्य तयार होते. खरं तर त्या पट्यात लाखो रंग असतात, पण आपले डोळे प्रमुख सात रंगच पाहू शकतात. चीनी लोक तर पाचच रंग असतात असे अजून मानतात. क्षितिजामुळे आपल्याला फक्त वरचा अर्धा भाग दिसतो. उंचावरून किंवा विमानातून पाहिल्यास गोल इंद्रधनुष्य दिसू शकते. समुद्रावर इंद्रधनुष्य पडले असेल तर तिथे अर्ध्यापेक्षा थोड़े जास्त दिसते. किरणांचा 42 अंशाचा कोन तयार होण्यासाठी किरण तिरपे यावे लागतात, त्यामुळे सकाळी किंवा संध्याकाळी इंद्रधनुष्य दिसते व ते ज्या क्षितिजावर सूर्य असेल त्याच्या विरुद्ध क्षितिजावर दिसते.

अशाप्रकारे तयार होणाऱ्या इंद्रधनुष्याला प्राथमिक इंद्रधनुष्य म्हणतात. याचा बाहेरचा रंग लाल तर आतला रंग जांभळा असतो. जर प्रकाश किरणाचे थेंबाच्या आत दोनदा, तीनदा, अनेकदा परावर्तन व अपवर्तन झाले तर एकावर एक अशी दोन, तीन, अनेक इंद्रधनुष्ये तयार होतात, त्यांना दुय्यम इंद्रधनुष्ये म्हणतात. फक्त वरच्याचा रंगक्रम खालच्या च्या उलट असतो, म्हणजे दुसरं जे तयार होतं त्याचा बाहेरचा जांभळा व आतला रंग लाल असतो. दुय्यम इंद्रधनुष्ये फारशी दिसत नाहीत कारण प्रकाश किरणाचे वारंवार परावर्तन झाल्यामुळे किरणाची तीव्रता कमी होते. त्यामुळे इंद्रधनुष्ये इतकी फिकट होत जातात की डोळ्यांना दिसू शकत नाहीत. शास्त्रज्ञांनी प्रयोग शाळेत एकाचवेळी दोनशे इंद्रधनुष्ये तयार करण्यात यश मिळवले आहे.

इंद्रधनुष्य तयार होण्यासाठी पावसाचेच थेंब लागतात असे नाही, दव, धुके, पाण्याचा फवारा, धबधबा अशा ठिकाणी ही इंद्रधनुष्य तयार होते. धबधब्याच्या ठिकाणी पूर्ण गोल इंद्रधनुष्य दिसू शकते. ब्राझील व अर्जेंटिना यांच्या सीमेवरील इग्वाझू व पराना या दोन नद्यांच्या

संगमातून 240 पेक्षा जास्त धबधबे तयार झाले आहेत. मीना प्रभू यांच्या ‘दक्षिण रंग’ मधे त्यांनी इथल्या गोलाकार इंद्रधनुष्यांचे  फार सुंदर वर्णन केले आहे. बर्फाच्या कणातून सुद्धा असा रंगीत पट्टा तयार होतो, फक्त त्याचा आकार, रंग वेगळे असतात. त्याला Fire bow म्हणतात.

अशाच प्रकारे चंद्राच्या प्रकाश किरणापासून सुद्धा इंद्रधनुष्य तयार होऊ शकते . फक्त प्रकाशकिरण तेवढे तीव्र असायला हवेत. जगाच्या कांही भागात हे moon bow दिसते.

आता अशी एक गोष्ट सांगणार आहे कि ती तर तुम्हाला खरीच वाटणार नाही. प्रत्येकाला दिसणारं त्याचं त्याचं इंद्रधनुष्य वेगळं असतं. कारण प्रत्येकाचे क्षितिज वेगवेगळे असते . कवी कल्पना वाटती आहे नं! सूर्याकडे आपली पाठ असते. समोर इंद्रधनुष्य असतं. बघणाऱ्याच्या डोक्यावरून, डोक्याच्या सावलीच्या दिशेने 42 अंशाचा कोन करणारे प्रकाश किरण पाण्याच्या थेंबात प्रवेश करतात. तेवढया जागेत सुद्धा अनंत थेंब व अनंत प्रकाशकिरण असतात. त्याच किरणांचे  पृथःकरण होऊन रंगीत इंदधनुष्य बघणाऱ्याच्या डोळ्यासमोर तयार होते. दुसऱ्या माणसा समोर दुसरे किरण व दुसरे थेंब असणार म्हणजे त्याला दिसणारे इंदधनुष्य पण वेगळे असणार. तसेच बघणाऱ्याच्या डोळ्यात शिरणारे साती रंगांचे किरण एकाच थेंबात तयार झालेले येत नाहीत. वेगवेगळया अपवर्तनाच्या कोनामुळे वेगवेगळ्या थेंबातून वेगवेगळ्या रंगाचे किरण येऊन आपले इंद्रधनुष्य बनते. त्याहून पुढची गंमत, जर हे इंद्रधनुष्य गोल असेल तर त्याच्या मध्यभागी

बघणाऱ्याच्या चेहऱ्याचे प्रतिबिंब ही दिसते. म्हणून असं इंद्रधनुष्य दिसणे आपण भाग्याचे मानतो. अशा गोल इंद्रधनुष्याला इंद्रवज्र म्हणतात.

जरी शास्त्रीय खुलासे कळायला अवघड वाटले तरी होणारे परिणाम वाचून गंमत वाटली असेल नं!आपले डोळे सुद्धा काय काय भास निर्माण करतात!!

ही साठा उत्तराची कहाणी पाचाऊत्तरी सुफळ संपूर्ण!!!

© सौ.मंजिरी येडूरकर

लेखिका व कवयित्री, मो – 9421096611

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ नाती अपडेट व्हायला हवीत… लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – सौ.बिल्वा शुभम् अकोलकर ☆

? विविधा ?

☆ नाती अपडेट व्हायला हवीत… लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – सौ.बिल्वा शुभम् अकोलकर 

नेहमीप्रमाणे आठवड्यातून मी घरी जात असतो तसाच कालही गेलो. घरी आलो की सगळी दुनिया विसरून मी माझ्या दोन वाघांशी म्हणजे माझ्या निर्भय आणि शार्दुल सोबत मस्त रमून जातो. गेल्या गेल्या असाच रमून गेलो. बायकोने चहा दिला. चहा घेत असताना आमची दिदी आली, दिदी म्हणजे माझ्या मोठ्या भावाची मुलगी. तसा तो चुलत भाऊ पण मला सख्खा भाऊ नसल्यामुळे माझी सगळी चुलत भावंडे मी सख्ख्यासारखी ठेवली आहेत. भावांची बहिणींची सगळी लेकरं मला तात्या म्हणूनच बोलतात.

दिदी तसच मला पाहून जोरात आनंदाने ओरडली.”अय्या तात्या कधी आलायस, बरा आहेस का? असं म्हणत जवळ येऊन बसली आणि म्हणली, ”तात्या अरे पुढच्या महिन्यात लग्नाची तारीख काढायची म्हणतायत पप्पा. ”मी या दोन वाघांना मिठीत घेऊन रमून गेलो होतो तिच्या या वाक्याने मी थोडासा गडबडलो. मी म्हणलं दिदी कुणाचं गं लग्न? दिदीने सांगितलं तिचंच लग्न म्हणून आणि फलटण चे पाहुणे आहेत. सगळं ठरवून झालं आहे तात्या फक्त तारीख काढायची बाकी आहे. आणि तू हवा आहेस इथं, सुट्टी घे. बाकीचे कोणते कार्यक्रम घेऊ नकोस. दिदी हे बोलत होती आणि मी आतून  घायाळ होत चाललो होतो. कारण यातलं एक टक्कासुद्धा माझ्या कानावर आलेलं नव्हतं. मी बायकोला जोरात आवाज देऊन बाहेर बोलावलं आणि रागाने विचारलं, की घरातली एवढी महत्वाची गोष्ट तू मला का सांगितली नाहीस. तर तिलाही यातलं काही माहीत नव्हतं. मला प्रचंड आतून वेदना होत होत्या. मी यांचा कुणीच नाहीय का? म्हणून आतून हुंदकत होतो. त्याच तंद्रीत पायात चप्पल घातली आणि थेट त्याच्या घरी. जेमतेम दहा मिनिटांचं पावली अंतर आमच्या दोन घरांमध्ये.

आमचं गाव असल्यामुळे घराची दारे बंद नसतात, की दारावर बेल वैगेरे नसते. थेट घरात घुसलो तर हा मोठा भाऊ आमचा नुकताच जेवायला बसला होता. मी कसलाही विचार न करता त्याला एवढंच म्हणलं. ”का रे दादा आपल्या दीदीला पाहुणे येऊन पसंत करून गेले. सगळी बोलणीसुद्धा झाली. फक्त तारीख काढायची राहिलीय आणि यातलं आम्हाला कुणालाच माहीत नाही असं का.? तर मला म्हणाला,”तुम्हाला कुणाला आमची काळजी आहे का.? तुम्हाला कुणाला आमचं चांगलं झाल्याचं बघवतच नाही. त्याच्या या बोलण्याने मी कोसळून गेलो. ”मी म्हणलं अरे आम्हाला कळलं तर आम्ही येणार ना. तर तो रागाने एकटक माझ्याकडे पाहत म्हणाला, नितीनराव आठ दिवसांपूर्वी मी तुला व्हाट्सअप्प ला मॅसेज करून ठेवलाय की दिदीला फलटणचे पाहुणे बघायला येणार आहेत म्हणून आणि तू अजूनही तो मॅसेज साधा वाचला सुद्धा नाहींयस. मी रोज पाहतोय तू ऑनलाईन असतोस पण माझा मॅसेज तू वाचत नाहींयस.

तातडीने मी माझा मोबाईल खिशातून बाहेर काढला, प्रिय दादा म्हणून त्याच्यासमोर नाव सर्च केलं आणि व्हाट्सअप्प ला पाहिलं तर खरोखर त्याने मला आठ दिवसापूर्वी तसा मॅसेज पाठवला होता. मी त्याच्याकडे नजर उचलून पाहिलं. तर, आता तुझ्यात आणि माझ्यात कसलेच नाते उरले नाही असा काही त्याच्या चेहऱ्यावरचा अनोळखी भाव पाहून मला त्याची अक्षरशः किव आली.

मग मी बोलायला सुरवता केली, की, ”दादा कामाच्या घाईत व्हाट्सअप्प वर येणारे प्रत्येक मॅसेज प्रत्येकजण आवर्जून वाचतोच असे नाही. मोबाईल काय माझ्या शरीराचा अवयव नाहीय दादा. त्यावर काही आलं की लगेच माझ्या मेंदूशी कनेक्ट होत नसते. आपलं घर लांब नव्हतं. तुझ्या बायकोने येऊन सांगायला हवं होतं किंवा साधा एखादा फोन तरी करायचा ना निदान, तुझा आवाज कानातून मेंदूत तरी गेला असता. तू व्हाट्सअप्प वरून मला कळवलं म्हणजे तू तुझं नात्यातील कर्तव्य पार पाडलं असं वाटलं का तुला? आणि तो माझ्याकडून मॅसेज वाचायचं राहून गेलं म्हणून तू इतक्या टोकाचे बोलतोय की बस्स आपल्यात आता काहीच नातं नाही राहिलं. मग तस असेल तर आम्हीही व्हाट्सअप वरूनच अक्षता पाठवतो, त्या दिवशी हवं तर दिदीचा फोटो dp ला ठेवतो. तू तिकडून आम्हाला जेवणाचं ताट पाठव चालेल ना दादा हे, ’यावर जरा तो गार पडला. मी प्रचंड अस्वस्थ होतो. ”माझ्या भावाच्या मुलीच्या लग्नात वरातीत मित्रांना घेऊन तंगड्या वर करून नाचायचं स्वप्न पाहणारा मी. नसेल माझी परिस्थिती सध्या तुझं ओझं उचलण्याची पण कुठूनतरी हप्त्यावर का होईना निदान एक गोदरेजचं कपाट तरी मी घेतलंच असतं की रे माझ्या दीदीसाठी. लग्नाच्या मांडवात पंगतीला भात वाढण्याची स्वप्न पाहणारा हा तुझा भाऊ केवळ तुझा व्हाट्सअप्प चा मॅसेज मी वाचला नाही म्हणून तुला इतका परका वाटायला लागला का रे? हे व्हाट्सअप्प इतकं महत्वाचं झालं का? “ हे व्हाट्सअप कधी आलं? तुझा माझा संवाद साधण्यासाठी आपल्याला याची गरज पडावी? ”एखादी साधी गोष्ट असती तर मी समजून घेतलं असतं पण, आयुष्यातली इतकी महत्वाची गोष्ट तू समोरासमोर माझ्याशी न बोलता या माध्यमातून सांगू पाहत होतास.?

दादा वयाने मोठा आहे. माझ्या बोलण्यावर तो मान खाली घालून उभा होता. त्याची चूक त्याला कळली होती. पण खरंतर तो चुकीचा नव्हताच. तो डिजिटल होता होता इतका गुंतून गेला की नातीसुद्धा त्यावरच टिकवू पाहायला लागला. दोघांच्याही डोळ्यात गच्च पाणी भरून आलं होतं. तसाच त्याला जोरात आवळून मिठीत घेतला. मिठीत येत फक्त एवढंच म्हणाला, नितीन सॉरी भावा, चुकलं, आज कळलं आयुष्यात की तू कवी का आहेस ते.

घट्ट झालेली मिठी मी डोळे पुसत पुसत सैल केली. हातात मोबाईल घेतला. नेट सुरू केलं. व्हाट्सअप्प उघडलं आणि नाव पुन्हा सर्च केलं प्रिय दादा. तो हे पाहतच होता. दोघांचेही डोळे ओसंडून वाहत होते आणि मी त्याच्यासमोर त्याला तिथून कायमचं ब्लॉक केलं आणि एवढंच म्हणलं, आयुष्यातली सगळी सुख दुःखे समोरासमोर भेटून बोलत जाऊया, हात हातात धरून संवाद साधत राहूया, आपल्या नात्यात संवाद साधण्यासाठी असल्या कुठल्याच माध्यमाची आपल्याला गरज पडता कामा नये, असं म्हणत दोघेही एका ताटात जेवलो. इथं सेल्फी काढावा वाटला मला पण तो मोह आवरला. तसाच मी माझ्या घरी आलो आणि तो त्याच्या घरी राहिला.

आज कायमचं अंतर वाढत जाणार होतं. मी अंतर वाढवणाऱ्या गोष्टीच संपवून टाकल्या.

मित्रांनो संवाद साधणारी माध्यमे आज प्रत्येक घरात आहेत. आपण याच्याशी कनेक्ट झालोय. जग जवळ आल्याची फिलिंग आपण अनुभवत असताना आपली नाती दुरावत तर चालली नाहीत ना? याचे भान आपल्या प्रत्येकाला असायला हवे म्हणूनच हे लिहावं वाटलं मला.

खालील कवितेच्या ओळी माझ्या मनाचा अंतरंग अक्षरशः ढवळून काढत आहेत त्या ओळी ………

एकविसाव्या विज्ञान युगात

ही केवढी मोठी घोडचूक

रक्ताच्या नात्यालाही आज

लागते व्हाट्सअप आणि फेसबुक….

आणि खरं सांगू तुम्हाला,

खरच आपली जेवढी रक्ताची, जवळची, जी आपली असणारी माणसं, जिथं खरंच या लोकांशी समोरासमोर हातात हात घेऊन संवाद व्हायला हवा असं वाटणारी माणसं जी आहेत ना, त्यांना व्हाट्सअप वरून कायमचं ब्लॉक करा. काळजाचा डेटा कायम चालू ठेवा. तिथून ही नाती कधीच ब्लॉक होऊ देऊ नका. एकमेकांशी संवाद साधत, डिजिटल होता होता नाती जपता जपता आनंदाने जगता येईल आपण तसे जगुया.

लेखक – अनामिक

संग्रहिका: सौ.बिल्वा शुभम् अकोलकर

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ सेवाग्राम… ☆ सौ कल्याणी केळकर बापट ☆

सौ कल्याणी केळकर बापट

? विविधा ?

सेवाग्राम☆ सौ कल्याणी केळकर बापट

मागे येऊन गेलेल्या कोरोनाच्या लाटेने आपली सगळ्यांमध्ये भ्रमंती, पर्यटन ह्या बाबतीत विचार  करायची असलेली खरतरं शक्तीच काढून घेतलीय. एरवी आपल्याला सवय असते अगदी दोनचार दिवस जरी मोकळे,सवडीचे मिळाले की आपण लगेच कुठेतरी जवळपास का होईना पण सहपरीवार वा मित्रमंडळींसोबत सहलीस जाण्याचे ईमले बांधायला लागतो. ह्या फिरस्तीच्या आवडीच्या नादापायी खूपदा लांबवरचा,दूरवरचा प्रदेश आपण आवर्जून बघतो मात्र आपल्या जवळचा आसपासचा प्रदेश मात्र पाहू पाहू करीत बघायचा राहूनच जातो.भलेही हा जवळील सुप्रसिद्ध प्रदेश आपल्या डोळ्याखालून जात नाही मात्र दूरदूरचे लोक ह्याला भेट देण्यासाठी, त्याचा अभ्यास करण्यासाठी दूरवरून येतात.

आमचा विदर्भ हा चांगल्या गोष्टींसाठी प्रसिद्ध असणे ही बाब आम्हां सगळ्यांसाठीच अभिमानाची आहे.विदर्भ सुद्धा संतमहात्मे, थोर पुरुष ह्यामुळे ओळखला जाऊ लागला तर ही बाब आपणांसाठी जरा जास्तच गौरवाची ठरते.

विदर्भातील वर्धा जिल्हा हा सेवाग्राम व पवनार ह्या पवित्र भूमींसाठी सुप्रसिद्ध.  ८ एप्रिल. हा दिवस आचार्य विनोबा भावे ह्यांच्या पवनार आश्रमाच्या स्थापनेचा दिवस. खरोखरच अशी ठिकाणं बघितली की नतमस्तक व्हायला होतं.आता थोडसं आचार्य विनोबाजी आणि पवनार आश्रमाबद्दल जाणून घेऊया.

आपली आई ही बहुतेक प्रत्येक व्यक्तीचं दैवत,गुरु असते. लहानपणी तर आई हेच बाळाचे सबकुछ असते असही म्हणायला हरकत नाही. त्यामुळे आपल्या आईसाठी आपल्याला काही करता आलं तर त्याचं आत्मिक समाधान काही ओरचं लाभतं बघा. अशाच एका असामान्य व्यक्तीने आपल्या आईसाठी संस्कृत मध्ये असलेली भगवद्गीता ही समजण्यास सोप्प्या मराठी भाषेत लिहीली  तीच ही “गीताई” होय. ती व्यक्ती म्हणजे दुसरे तिसरे कोणी नसून आपले आचार्य विनोबाजी भावे होतं.

11 सप्टेंबर 1895 रोजी कोकणात विनोबाजींचा जन्म झाला. आज त्यांची जयंती.त्यांना विनम्र अभिवादन.भारतीय संस्कृती व जीवनशैलीबद्दल त्यांचा विशेष अभ्यास होता. राष्ट्रभाषा हिंदी असावी व लिपी देवनागरी असावी, असा त्यांचा आग्रह होता.

वेगवेगळ्या भाषांच ज्ञान अवगतं असणं हा खरोखरीच कौतुकाचा विषय. साधारण तीन चार भाषांच्या वर जर कोणाला जास्ती भाषा अवगतं असतील तर मला त्या व्यक्तींच खूप कौतुक वाटतं.ह्या अवलीयांना तर तब्बल  १४ भारतीय भाषा येत होत्या. वेद आणि आश्रम व्यवस्थेवर त्यांचा गाढा विश्वास आणि अभ्यास होता.

मा. विनोबाजींनी भरपूर प्रमाणात जमीनीचा मालकी हक्क असलेले जमीनदार व भूमिहीन जनता ह्यामधील प्रचंड तफावत व  त्यापासून निर्माण झालेली दरी जाणली आणि मग त्यांनी सुरू केली स्वातंत्र्योत्तर काळातील महत्त्वाची कामगिरी म्हणजे भूदान चळवळ. देशातील जमीनदारांनी त्यांच्या जमिनीचा सहावा हिस्सा भूमिहीनांसाठी दान करावा, असे त्यांचे आवाहन होते. १९५१ साली काही लोकांनी तेलंगण भागात जमीनदारां  विरुद्ध संघर्ष केला. तेव्हा जमिनीची योग्य वाटणी केली तरच खरी सामाजिक क्रांती होऊ शकेल, अशी भूमिका विनोबांनी घेतली. केवळ समाज प्रबोधनातून ७० दिवसांत त्यांना सुमारे १२ हजार एकर जमीन मिळाली.

त्यांचा कोणताही विचार वा दृष्टिकोन हा वैश्विक असायचा.महात्मा गांधींचे ते एकनिष्ठ अनुयायी होते.१९४८ साली महात्मा गांधींच्या निधनानंतर निर्माण झालेल्या हिंसेच्या पार्श्वभूमीवर विनोबांनी सत्य-अहिंसा व सर्वधर्मसमभावावर आधारलेला सर्वोदयाचा मार्ग सांगितला. म्हणूनच जणू ह्या गांधीजींच्या तत्त्वावरील ‘श्रद्धा’ परत मजबूत करण्याचे काम त्यांनी केले, असे मानले जाते. आचार्य दादा धर्माधिकारी यांचे या कामी त्यांना बहुमोल सल्ला व सहकार्य लाभले.

आपला सर्वांगीण व्यासंग वाढवितांना त्यांनी कुराणाच्या मराठी भाषांतरापासून ते गीताई पर्यंत अनेक ग्रंथ लिहिले. ‘साम्ययोग’ नावाचे मासिक ते पवनार आश्रमातून काढत होते. विनोबाच्या इतर ग्रंथात ऋग्वेदसार, ईशावास्य वृत्ती, वेदान्ससुधा, गुरुबोधसार, भागवतधर्म प्रसार यांचा समावेश आहे. त्यांचे ‘मधुकर’ नावाचे पुस्तक आबालवृद्धात परिचित होते.

विदर्भाचा गौरव म्हणून आपल्याला त्यांच्या पवनारच्या आश्रमाचा उल्लेख करता येईल.त्या आश्रमात त्यांनी बाजार गाठावा लागणारं नाही हे तत्व बाळगून शेतीमध्ये भाजीपाला व धान्य पिकवायला सुरवात केली. त्यांनी ऋषीशेती चा प्रघात सुरू केला.धाम  नदीचे तीरावर आचार्य विनोबा भावे यांचा आश्रम आहे. हा आश्रम १५ एकर जागेवर् विस्तारलेला आहे. ह्यात खुप् जैविक विविधता आहे. अनैसर्गिक गोष्टींपासून खुप दुर आणि निसर्गाच्या सान्निध्यात वसलेला असा हा आश्रम ईथे येणा-या लोकांना आकर्षित करतो.  विनोबांनी हा आश्रम खास करून् महिलांसाठी चालु केला. येथे येणा-या महीला साध्वी किंवा  उपासक होत्या. विनोबाजींनी वय वर्षे पन्नास ते सत्तर च्या दरम्यान अख्खा भारत पालथा घातला.त्या द्वारे जनजागृती पण त्यांनी केली.अशा या गौरवशाली व्यक्तीचा सन्मान भारतसरकारने 1983 मध्ये त्यांना मरणोत्तर भारतरत्न हा पदवी देऊन केला.

दिवाळीच्या सुमारे सात दिवस आधी विनोबांनी ‘प्रायोपवेशन’ सुरू केले. प्रशासनातील मोठे अधिकारी जिल्हाधिकारी, शल्यचिकित्सक, पोलिस अधीक्षक यांच्या उपस्थितीत व असंख्य कार्यकर्त्याच्या गराड्यात विनोबांनी १५ नोव्हेंबर १९८२ रोजी म्हणजे दिवाळीच्या अमावस्येच्या दिवशी सकाळी देहत्याग केला. पंतप्रधान इंदिरा गांधींपासून सर्व राज्याचे राज्यपाल व मुख्यमंत्री त्यांच्या अंत्यसंस्कारास्तव आश्रमात उपस्थित होते.

आज पवनार आश्रमाच्या स्थापनेच्या दिवसामुळे विनोबाजींचे थोर कार्याची परत एकदा उजळणी झाली.

©  सौ.कल्याणी केळकर बापट

9604947256

बडनेरा, अमरावती

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ तो आणि मी…! – भाग ३ ☆ श्री अरविंद लिमये ☆

श्री अरविंद लिमये

? विविधा ?

☆ तो आणि मी…! – भाग ३ ☆ श्री अरविंद लिमये ☆

(पूर्वसूत्र- माझ्याही समोर पुढे आयुष्यभर हे असे कसोटीचे क्षण येणार आहेत याची मला कल्पना कुठून असायला? पण म्हणूनच ‘त्या’च्यापर्यंत पोहोचणारा माझा प्रवास ‘त्या’चेच बोट धरून अगदी निश्चिंतपणे सुरू झाला होता एवढं खरं !!)

तथाकथित चमत्कारांवर माझा विश्वास नाही. चमत्कारांवर विश्वास ठेवून भ्रमित होणंही योग्य नाही असंच मला वाटतं. त्या

बालवयातल्या मी प्रमुख साक्षीदार असणाऱ्या अनेक प्रसंगांच्या बाबतीत मात्र हे असं विश्लेषण करायची पात्रता त्यावेळी माझ्याजवळ नव्हती म्हणून असेल पण तेव्हा तरी ते चमत्कारच वाटले होते. आज इतक्या वर्षानंतर त्या प्रसंगांचं पुनरावलोकन करताना मात्र मी म्हणेन की ते प्रसंग चमत्कार नसले तरी अनाकलनीय मात्र नक्कीच होते आणि त्यामागे ईश्वरी कृपालोभाचे संकेतही निश्चितच होते

आमच्या कुरुंदवाडच्या वास्तव्यातले असेच हे प्रसंग. तिथे बाबांचा नित्यदर्शनाचा नेम प्रतिकूल परिस्थितीतही कसा निष्ठेने सुरू होता हे यापूर्वीच सविस्तरपणे सांगितलेले आहेच. त्यांच्या या निरपेक्ष सेवेनंतर ते निश्चितच कसोटीला उतरले असणार. एरवी हा प्रसंग अशा पद्धतीने घडलाच नसता.

तो काळ साधारण १९५४ ते १९५८ चा. विष्णूमंदिराच्या जवळच्या लेलेवकिलांच्या वाड्यात आमचं बिऱ्हाड होतं.‌ मोठं स्वैपाकघर आणि माडीवरची प्रशस्त खोली आमच्याकडे आणि स्वतंत्र स्वयंपाकघर असलेल्या बाकी पाच खोल्यांचा ऐवज लेले कुटुंबासाठी अशी विभागणी होती.‌दोन्ही कुटुंबे दूरच्या नात्यातलीच. त्यामुळे एकाच घरातले हे वेगवेगळे वास्तव्य केवळ सोय आणि सोबत म्हणून दोघांनी मनापासून स्वीकारलेलं होतं.

माझ्या पाठच्या भावाचा जन्म तिथलाच. ऑगस्ट १९५६ चा. त्याच्याच जन्माच्या वेळची ही गोष्ट. धुवांधार  पावसामुळे शेजारच्या आनेवाडीला  (हा पंचगंगेचा एक फाटा) नेहमीप्रमाणे पूर आलेला. पुराचे पाणी गावभर पसरत आमच्या वाड्याच्या मुख्य उंबऱ्याला लागलेले आणि धुवांधार पाऊस सुरूच. आईचे दिवस भरत आले होते.पाऊस असाच कोसळत राहिला तर पाणी कुठल्याही क्षणी घरात घुसू शकेल अशी ती अवेळ. त्यामुळे मुलांना वरच्या माडीवर झोपवून दोन्ही कुटुंबातली मोठी माणसं रात्रभर एकत्र पडवीतच बसून होती. त्या काळात बाळंतपणाला सुईणच घरी यायची. पण या पावसा-पूरात सुईण येणार कशी ही विवंचना होती ती वेगळीच!

“दादा, आता काय करायचं?” लेले वकील बाबांना म्हणाले. बाबा काळजीत होतेच. त्यांनी आईकडे पाहिलं. खरंतर अशा परिस्थितीत आईचा जीव टांगणीला लागायला हवा होता पण निदान वरकरणी तरी ती शांतच होती.

“आपण काय करणार? होईल ते पहात रहायचं.” ती शांतपणे म्हणाली.

“ते खरंच.पण तुम्हाला अचानक त्रास सुरू झाला तर..?” लेलेकाकू तिच्या जवळच बसल्या होत्या,त्या म्हणाल्या. त्यांच्या  बोलण्यात त्यांच्या मनातली काळजी लपून रहात नव्हतीच.  स्वतःचीच समजूत घातल्यासारखं आई म्हणाली,

“त्या सगळ्याचा भार दत्त महाराजांवर. संकट नाही यायचं. आणि आलंच तर शेवटी त्याचं निवारणही तेच करतील.”

परिस्थिती चिंताजनक असूनसुद्धा आईच्या शब्दांमुळे इतरांच्या मनावरचं ओझं थोडं तरी हलकं झालं. मध्यरात्र उलटून गेल्यानंतर खूप वेळाने तिथे पडवीतच पसरलेल्या अंथरुणांवर सर्वजण आडवे झाले तरी कुणाच्याच डोळ्याला डोळा नव्हता. आणि आश्चर्य म्हणजे पहाटेच्या आसपास पावसाचा जोर हळूहळू ओसरत चालला आणि फटफटीत उजाडेपर्यंत उंबऱ्याशी येऊन ठेपलेल्या पाण्याने दोन पावलं माघार घेतली होती! आईचे दिवस भरत आल्याचं दडपण तिकडे सुईणीच्या मनावरही होतंच. त्यामुळेच ती विषाची परीक्षा नको म्हणून,स्वत:च्या जीवाची पर्वा न करता सकाळी सकाळीच चिंब भिजल्या अवस्थेत कमरेपर्यंतच्या पाण्यातून चालत आमच्या घरी मुक्कामाच्याच तयारीने येऊन पोचली तसा सर्वांचा जीव भांड्यात पडला! त्याच दिवशी दुपारी बाळाचा सुखरूप जन्म झाला!पण…?

अतिशय अनपेक्षितपणे सगळं सुरळीत पार पडल्याचं समाधान मात्र दीर्घकाळ टिकणार नाहीय याची कुणालाच कल्पना नव्हती. कारण दुसरं जीवघेणं संकट दबा धरून बसलेलं होतंच!

क्रमश:…  (प्रत्येक गुरूवारी)

©️ अरविंद लिमये

सांगली (९८२३७३८२८८)

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares
image_print