मराठी साहित्य – विविधा ☆ तो आणि मी…! – भाग ७८ ☆ श्री अरविंद लिमये ☆

श्री अरविंद लिमये

? विविधा ?

☆ तो आणि मी…! – भाग ७८ ☆ श्री अरविंद लिमये ☆

(पूर्वसूत्र- सहस्त्रबुद्धे आजोबांना असं प्रसन्न हसताना मी प्रथमच पहात होतो. पण त्यांच्या चेहऱ्यावरचं ते स्मित क्षणभरच टिकलं. दुसऱ्याच क्षणी ते विरून गेलं. तो प्रसंग पुन्हा जगत असल्यासारखे ते एकटक समोर पहात राहिले. त्यांचा चेहरा विदीर्ण झाला. मनाला झालेल्या खोलवर जखमेला नकळत धक्का लागावा तशी ती जखम भळभळून वहात राहिली.)

हा कसा एक नंबरचा हट्टी आणि तक्रारखोर माणूस आहे हे मला पटवून देताना त्या दिवशी नेमकं काय घडलं हे प्रभुदेसाईंनीही आधी मला सांगितलेलं होतंच. त्यानुसार त्या सकाळी प्रभूदेसाई नुकतेच केबिनमधे येऊन बसले होते. तेवढ्यांत त्या ब्रँचचे एक अतिशय महत्त्वाचे ठेवीदार सपत्निक केबिनमधे आले. त्यांना मोठ्या रकमेची ठेव बँकेत ठेवायची होती. त्यांचं हसतमुखाने स्वागत करून त्यांना वेगवेगळ्या डिपॉझिट स्किम्सची माहिती देत असतानाच हे सहस्त्रबुद्धे केबिनमधे घुसले. त्यांच्या कामाबद्दल तावातावाने बोलू लागले. प्रभूदेसाईंनी त्यांना शांतपणे ‘माझ्या हातातलं काम संपलं कीं तुम्हाला बोलावून घेतो मग आपण बोलू. तोवर तुम्ही थोडावेळ बाहेर बसा.. ‘ असं सांगताच ते खवळले. त्यांना कसं शांत करावं प्रभूदेसाईंना समजेचना. तेवढ्यांत ब्रॅंचचे अकाऊंटंट घाईघाईने आत आले. आजोबांना समजावत बाहेर घेऊन गेले आणि त्यांचं जे काही काम होतं ते पूर्ण करून दिलं असं प्रभुदेसाई म्हणाले होते. यानुसार त्यांच्या म्हणण्याप्रमाणे सारा दोष आततायी आणि विक्षिप्त असणाऱ्या सहस्त्रबुद्धे आजोबांचाच असूनही उलट त्यांनीच सूडबुद्धीने प्रभूदेसाईंबद्दल तक्रार केलेली होती.

या पार्श्वभूमीवर तीच घटना आज सहस्त्रबुद्धे आजोबा सांगत असताना हाच सगळा प्रसंग दुखावलेल्या अंतःकरणातून आपसूक झेपावत येणाऱ्या शब्दांतून उत्स्फूर्तपणे व्यक्त होत होता आणि बोलताना आजोबा दु:खातिरेकाने व्याकूळ झाले होते!

“त्यादिवशी मी महत्त्वाच्या कामासाठी लवकर बँकेत गेलो, तेव्हा सफाई करणाऱ्या शिपायाखेरीज दुसरं कुणीही आलेलं नव्हतं” सहस्त्रबुद्धे सांगू लागले.. *”* मी मुद्दामच लवकर गेलो होतो. कारण माझं काम तसंच महत्त्वाचं होतं. माझी बायको नुकतीच गेली होती. त्या धक्क्यातून मला सावरणं शक्यच नव्हतं. अचानक एक हात मोडलेल्या अपंगासारखी माझी अवस्था होऊन गेली. त्यातूनही कसंबसं सावरत मी माझी दैनंदिन कामं सुरू केली. आम्हा दोघांच्या जॉईंट नावाने असलेली बँक खाती, ठेवी यांच्यावरचं तिचं नाव कमी करून मुलीचं नाव वाढवून घेणं, त्यासाठी अधू मनाने दहा हेलपाटे घालणं.. माझ्या वयाचा विचार करता खूप दमवणारं आणि त्रासदायक होतं. माझी मुलगी मला प्रत्येक ठिकाणी जबाबदारीनं घेऊन जायची, माझी काळजी घ्यायची त्यामुळे दोन-तीन बँकांमधे विखुरलेली ही कामं हातावेगळी करणं मला शक्य झालं होतं. पण युनिट ट्रस्ट आॅफ इंडियाच्या एका युनिट स्कीम मधे गुंतवलेल्या मोठ्या रकमेचे पैसे परत मिळवणं या ना त्या कारणाने अवघड होऊन बसलं होतं. ते काम अखेरच्या टप्प्यावर असताना सर्व युनिटसच्या रिडम्शन फाॅर्मच्या मागं माझी सही करून व ती सही आमचं खातं ज्या बॅंकेत आहे त्या बँकेतील अधिकाऱ्याकडून अॅटेस्ट करून घेऊन प्रस्ताव त्वरित पाठवण्याची सूचना मला यूटीआयने दिली होती. त्यानुसार मी माझी सही करून अटेस्टेशन घेण्यासाठी त्या दिवशी सकाळी मुद्दामच लवकर बँकेत गेलो होतो. लगेचच बँकेतले कर्मचारीही एकेक करून ब्रॅंचमधे येत असतानाच ब्रँच मॅनेजर प्रभूदेसाईही आत आले. केबिनजवळ बाहेर ठेवलेल्या सोफ्यावरच मी त्यांची वाट पहात बसलो होतो. मी उठून त्यांना नमस्कार केला पण त्याची दखलही न घेता ते केबिनमधे निघून गेले. मला याबद्दलही काही वाटलं नाही कारण ते गडबडीत असणार हे मी गृहीत धरलं होतं. तरीही त्यांचं रोजचं रुटीन सुरू होण्यापूर्वी आपलं हे काम करून घ्यावं म्हणून मी त्यांच्या केबिनमध्ये गेलो. त्यांनी त्रासिकपणे माझ्याकडं पाहिलं. मला थोडावेळ बाहेर बसायला सांगितलं. मी त्यांच्या बोलावण्याची वाट पहात बाहेर येऊन बसलो. माझं लक्ष आत केबिनकडंच होतं. तेवढ्यांत त्यांचा फोन वाजला तेव्हा नाराजीने फोनकडे पहात त्यांनी उभ्या उभ्याच स्वतःचा ड्रॉवर उघडला. आत ठेवलेल्या उदबत्तीच्या पुड्यातून एक उदबत्ती आणि काडेपेटी काढून त्यांनी ती उदबत्ती पेटवली. मागेच भिंतीवर लटकवलेल्या देवांच्या फोटोंना ओवाळत राहिले, दोनदोनदा नमस्कार केला, मग टेबल आणि स्वतःच्या खुर्चीकडे पहात ती उदबत्ती ओवाळून मागच्या फळीजवळ खोचून ठेवली आणि स्वतःच्या खुर्चीवर स्थानापन्न झाले. आता तरी ते मला बोलावतील असं वाटलं तेवढ्यांत घाईघाईने बँकेत आलेलं एक जोडपं केबिनमधे गेलं. त्यांना पहाताच तत्परतेने उठून त्यांचं हसतमुखाने स्वागत करीत प्रभुदेसाईंनी अतिशय अदबीने त्यांना बसायला सांगितलं. दोन मिनिटांच्या माझ्या कामासाठी मी मनापासून त्यांच्या बोलावण्याची वाट पहात इथं ताटकळत बसलेलो आहे हे त्यांच्या गावीच नव्हतं. त्यांची अॅटॅस्टेशनची सही घेऊन मला पोस्टात जाऊन तिथेही रजिस्टर करण्यासाठी रांगेत तिष्ठत उभं रहावं लागणार होतं. आत जाऊन त्यांना सही करण्याची विनंती करण्याखेरीज दुसरा पर्यायच नव्हता. पण मी ‘आत येऊ कां? ‘ असं विचारून दारात क्षणभर उभा राहिलो तेव्हा मला त्यांनी आत बोलावून काय काम आहे एवढं विचारणंच मला अपेक्षित होतं. पण तेही त्यांनी केलं नाही.
“बाहेर बसा. महत्त्वाचं काम करतोय ना मी? मी बोलावलं की आत या असं सांगितलं होतं ना तुम्हाला? मी कामात आहे दिसत नाही कां? ” म्हणाले. एका वयोवृद्ध ग्राहकाशी हा माणूस या पद्धतीने वागूच कसा शकतो? .. या विचाराने मी अस्वस्थ झालो. कसाबसा राग आवरत मी त्यांच्यासमोर जाऊन उभा राहिलो.

“तुम्ही बँकेत यायच्या आधीपासून गेला अर्धा तास मी तुम्ही बोलावण्याची वाट पहात बसून होतो. साधं माझी सही ऍटॅस्ट करून द्यायचं एक मिनिटाचं काम आहे फक्त. तेवढ्यासाठी एक तास बसून ठेवणार आहात कां मला? “

मी चिडून विचारलं आणि सोबतच्या एनव्हलपमधून मी मागे सही केलेला यूटीआयचा रिडम्शन फॉर्म काढून मी तो त्यांच्यासमोर ठेवला. त्यांनी चिडून माझ्याकडे पाहिलं, तो फॉर्म उचलला, त्यावरील डिपॉझिटर्सच्या नावांमधला मी आणि माझी बायको असा दोघांच्या नावाचा उल्लेख पाहिला आणि अतिशय उर्मटपणे तो फाॅर्म माझी सही अॅटेस्ट न करताच माझ्याकडे भिरकावला.

“जॉईंट आहे ना हो ही इन्व्हेस्टमेंट? मग? दोघांच्या सह्या नकोत कां? फक्त तुमची एकट्याचीच सही आहे यावर. बघाs नीट. बायकोचीही सही घेऊन या. त्याशिवाय अॅटॅस्टेशन करता येणार नाहीss” विजयी मुद्रेने ते म्हणाले. माझ्या तळपायाची आग मस्तकात जाऊन पोचली.

“बायकोची सही आणायला वर जाऊ कां आताss तिच्या मागं? ” मी ओरडलो. ” नीट वाचाs तोs रिडम्शन-फाॅsर्म. माझ्या बायकोची डेट आॅफ डेथ आहे त्यावर. आणि सोबत डेथ सर्टिफिकेटही. बायको मेलीsय माझीss. इथल्या माझ्या खात्यातच जमा होणाराय ही सगळी रक्कम नंतर. म्हणून आलोय तुमच्या दारात. खातं तुमच्या बँकेत आहे म्हणून भीक मागतोय तुमच्याकडं….. ” मी असंच किती वेळ बोलत होतो मला माहित नाही. नैराश्य आणि टोकाच्या संतापाने मी बेभान झालो होतो…. ”

ते बोलायचं थांबले तसं सुन्न होऊन ऐकत राहिलेला मी भानावर आलो. त्या दिवशी नेमकं काय झालं होतं हे सांगताना संतापाने बेभान झालेल्या प्रभूदेसाईंनी सांगितलेली घटना आणि आज सहस्त्रबुद्धे आजोबांनी भावविवश होत सांगितलेली घटना या दोन्ही एकच होत्या पण दोघांच्या सांगण्यातले क्रम आणि संदर्भ यामधली तफावत लक्षणीय होती. आज ते सगळं या आजोबांच्या तोंडून ऐकल्यानंतर आधी न जाणवलेला प्रभुदेसाईंच्या सांगण्यामागचा त्यांचा स्वतःच्या बचावाचा पवित्रा मला ठळकपणे जाणवला आणि अर्थातच खटकलाही. या उलट आजोबांच्या प्रत्येक शब्दातून पाझरणारी त्यांच्या मनातली वेदना आणि सात्विक संताप माझ्या मनावर ओरखडे ओढून गेला!
‘सत्य’ माणसागणिक कसं रंग बदलणारं असू शकतं याचा मन अस्वस्थ करणारा अनुभव मी घेत होतो! त्यादिवशी नेमकं काय घडलं याच्या प्रभूदेसाईंनी आधी रेखाटलेल्या चित्रातले बेरंग मला आता अधिकच खुपू लागले. सहस्रबुद्धे हे अतिशय हेकेखोर, सतत तक्रारी करणारे, बँकेतल्या मॅनेजर व स्टाफशी बोलताना कसलाही विधिनिषेध न बाळगणारे असं प्रभूदेसाईंनी केलेलं सहस्त्रबुद्धे आजोबांचं वर्णन वस्तुस्थितीचा विपर्यास करणारं तर नसेल? कारण..

“हा एक नंबरचा हेकेखोर, हट्टी आणि तक्रारखोर माणूस आहे ” असं प्रभूदेसाई म्हणाले होते. याउलट आजोबांनी स्वतःची कैफियत मांडताना कुणावरही थेट दोषारोप न करता राष्ट्रीयकृत बँकांच्या शाखांकडून ग्राहक सेवेबाबत होणाऱ्या दुर्लक्षाबद्दलची वस्तुस्थिती अतिशय नेमक्या शब्दांत पोटतिडकीने मांडली होती आणि हे करीत असताना त्याबाबतचा त्यांच्या मनातला सात्विक संताप टोकदारपणे जाणवलाही होता!

त्यांच्या तक्रारखोर स्वभावाबद्द्लचा माझ्या मनातला संभ्रम दूर करण्यासाठी त्याबाबत सहज सहस्त्रबुद्धे आजोबांना बोलतं केलं तेव्हा त्यांनी जे सांगितलं ते ऐकून तर त्यांच्याबद्दलचा माझ्या मनातला आदर अधिकच दुणावला….!!

तरीही या सगळ्यांत आपण भावनिक दृष्ट्या गुंतत चाललोय हे जाणवताच मी भानावर आलो. सहस्त्रबुद्धे आजोबांना समजून घेणं ठीक आहे, पण ते तक्रार करण्यामागच्या त्यांच्याच भूमिकेवर ठाम राहिले तर? त्यांनी तक्रार मागे नाही घेतली तर? नाही नाही.. असं होऊन चालणार नाही.. हा तिढा सुटायलाच हवा. तोही समाधानकारक आणि लवकरात लवकर. हे शक्य होईल?

मन असं शक्याशक्यतेच्या हिंदोळ्यावर झुलत असताना मला नेहमीच ‘त्या’ची आठवण येते. आत्ताही आलीच. ‘तो’आहे. पहातोय सगळं. मग काळजी कसली? या विचाराचा स्पर्श होताच मग थोडं शांत झालं.

या दोन दिवसात मनापासून केलेल्या प्रयत्नांती खूप कांही गवसलं होतं पण ते घट्ट धरून कसं ठेवायचं तेच समजत नव्हतं! अनिश्चितता या क्षणी तरी संपलेली नव्हती!!

क्रमश:…  (प्रत्येक गुरूवारी)

©️ अरविंद लिमये

सांगली (९८२३७३८२८८)

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ हुशारी… ☆ सुश्री मंजुषा सुनीत मुळे ☆

सुश्री मंजुषा सुनीत मुळे

? विविधा ?

☆ हुशारी… ☆  सुश्री मंजुषा सुनीत मुळे 

राज्यस्तरीय खुली निबंध स्पर्धा : विषयाचे बंधन / वयाची अट नाही… शब्दमर्यादा ६००-७०० शब्द.

—-ही ठळक जाहिरात वाचली, आणि मन एकदम शाळेत पोहोचलं. निबंधाचा प्रश्न मराठीच्या पेपरात हमखास पहिला असायचा, आणि हमखासच तो शेवटी लिहिण्यासाठी ठेवला जायचा. फार कष्ट घ्यावे लागायचे ना त्यासाठी. आणि तो पूर्ण होणारच नाही, या बेतानेच वेळ साधण्याची हुशारी केव्हाच जमलेली होती. —कारण मजकूर सुचायचाच नाही — मग लो. टिळकांवरचा निबंध, “त्यांचा मृत्यू १९२० साली झाला” या वाक्याने सुरु व्हायचा –कारण त्यांच्याबद्दल वाचलेलं ते शेवटचं वाक्य असायचं. अर्थात ‘ निबंध पूर्ण का झाला नाही ‘ या प्रश्नाला, ‘ बाकीचे सगळे प्रश्न अगदी व्यवस्थित लिहीत बसले, म्हणून पुरेसा वेळ उरला नाही’ हे उत्तर देतांना हुशारी पुन्हा उफाळून आल्याचा आनंद व्हायचा —————

“युरेका”——– स्पर्धेसाठी विषय सापडला –” हुशारीचे नाना प्रकार “. लगेच दीडशे रुपये भरून नाव नोंदवलंही.

दहा दिवसांची मुदत होती. पण पूर्वानुभवावरून शहाणं होत, लगेच लिहायला बसले.. { हेही हुशारीचे लक्षण }. सवयीने हातात मोबाईल होताच. लगेच गुगलकाकांना पाचारण केलं, कारण सगळी भिस्त त्यांच्यावरच तर होती. टाईप केलं–”हुशारीचे प्रकार”–पण १०-१५ वेळा पापणी लवली तरी स्क्रीन कोराच. -मग “प्रकार हुशारीचे”, “हुशारीचे विविध प्रकार”, “वेगवेगळ्या प्रकारची हुशारी” — असं कायकाय टाईप केलं, तरी तेच. इतकं गुगलून बघता बघता उत्साहही कमी होतोय अशी शंका वाटायला लागली. पण प्रश्न दीडशे रुपयांचा होता हो. —

“गुगलून बघण्यात “?– अरेच्चा– हा शब्द गुगलकाकांचा नक्कीच नाही. असे आगळेवेगळे वाक्प्रचार रूढ करणं ही तर जन्मजात भाषाप्रभूंच्या हुशारीची कमाल —

पुन्हा “ हुशारी”? — अचानक माझ्या अंगभूत {?} हुशारीला कोंब फुटायला लागले की काय … मी एकदम सरसावले —-” हुशारीचे नाना प्रकार “——–

 ‘अभ्यासातली हुशारी ‘ हा जगन्मान्य पहिला प्रकार. ज्ञानाशी त्याचा प्रत्यक्ष संबंध असावाच लागतो असे मुळीच नाही. पण याबद्दल इथे न लिहिणेच उत्तम. हुशारीचा याहून सरस प्रकार म्हणजे, खूप मन लावून अभ्यास करत असल्याचा बनाव रचण्यातली हुशारी—म्हणजे रात्री जागणे— {थर्मासात भरून ठेवलेला चहा संपेपर्यंत, किंवा बाकी सगळे गाढ झोपल्याची खात्री पटेपर्यंत-}—तरीही पहाटे लवकर उठून, कौतुक करून घेणे इ. इ. यात “ मन नक्की कुठे लागलं होतं “ हा प्रश्न निरागस पालकांना पडतच नाही. अपेक्षित मार्क मिळाले नाहीत की, “ सर कशी पार्शालिटी करतात ” हे पटवून देण्याची हुशारीही असतेच… पण हा वापरून गुळगुळीत झालेला प्रकार.

याहून परिणामकारक प्रकार, दुसऱ्याच्या वस्तूंवर डल्ला मारतांना वापरण्याचा —- भुरटी चोरी, पाकीटमारी, किंवा थेट दरोडा–. या कानाचे त्या कानाला कळू न देता चोरी करायला शिकवणारी हुशारी–डोळे मिटून दूध पिणारी— पण हा प्रकार तसा फशी पाडणाराही.

भीक मागणं हे तर अजिबातच हुशारीचं काम नाही असं कुणाला वाटत असेल तर असा समज साफ चुकीचा आहे. स्वतःची देहयष्टी लुळी पांगळी दाखवायची, की आपण आंधळा असल्याचं दाखवायचं, हे तर फार अक्कलहुशारीचं काम असावं.. ‘ सामाजिक मानसिकतेचा ‘ अभ्यास करावा लागताच असणार त्यासाठी.. सोंग बेमालूम जमावं लागतं… पण हे सगळं जमणं तुलनेनी तसं सोप्पं असावं.. आणि हिंदी चित्रपट असतात ना ट्रेनिंग द्यायला.. याची बरीच प्रॅक्टिकल्स शिकवतात ते..

आणखी एक प्रकार म्हणजे दुसऱ्याबद्दलच्या ऐकीव बातम्या तिसऱ्याला सांगतांना लागणाऱ्या हुशारीचा– त्रयस्थ वृत्तीने, केवळ दुसऱ्याच्या काळजीपोटी बोलत असल्याचे बेमालूम नाटक साधण्यासाठी हुशारी तर लागतेच. चहाड्या, काड्या, कागाळ्या, यासाठी हा प्रकार उपयोगी.. याचा उपप्रकार म्हणजे, स्वतःचा मोठेपणा इतरांना दाखवण्यासाठी प्रयत्न करतांनाची हुशारी. पण हाही तोंडघाशी पाडणाराच प्रकार.

तुलनेने सोपी हुशारी लागते –उंटावरून शेळ्या हाकण्यासाठी– यात स्वतःला फरक पडतच नाही— “ जनहो, खादी वापरा “ — सामाजिक पातळीवर वापरण्यासाठी उत्तम प्रकार –… याहून धूर्त हुशारी लागते ती दुसऱ्याच्या खांद्यावर बंदूक ठेवून गोळ्या मारतांना- असो. याच पातळीवरून “ चोर तो चोर, वर शिरजोर “ असे वागतांनाही हुशारी लागते? बहुतेक नाहीच. पण काहींना मात्र तसे ठामपणे वाटते.

हुशारीचे मॉडर्न प्रकारही खूप आहेत सांगण्यासारखे. पण त्याबद्दल नंतर कधीतरी … एक मासला म्हणून सांगायचे तर…. प्रत्यक्षात ५०-६० रुपयाच्या वस्तूची किंमत १५० रु. सांगायची आणि मग ग्राहकाने घासाघीस केल्यावर त्याच्यावर उपकार करत असल्याचे दाखवत ती १०० रु. ला द्यायची. अर्थात हे अगदीच किरकोळ उदाहरण झाले. या प्रकारची हुशारी प्रत्यक्षात फार फार वरच्या पातळीवरच्या ‘धंद्यांसाठी’ अत्यावश्यक असते.

बाप रे; हुशारीचे किती प्रकार सांगितले ना मी — गुगलकाकांच्या ज्ञानात भर घालू का?– नकोच. — जगभरातून माहिती गोळा करून, ती आपल्याच नावावर खपवण्याची हुशारी, हेच तर त्यांचं भांडवल आहे. आणि त्यांना न कळवण्यातच माझी हुशारी cum शहाणपण——

 —बघा- असं होतं –” ज्ञानयुक्त शहाणपणमिश्रित हुशारी “ हा आजकाल दुर्मिळ म्हणावा असा विशेष प्रकार सांगायचाच राहिला… मला तो माहितीये. पण हा प्रकार आजकाल सर्रासपणे वापरतांना दिसत नाही ना कुणी, म्हणून नजरेआड झाला इतकंच — त्याबद्दलही नक्कीच लिहू शकते मी.. पण इथे आणखी काही नाही लिहू शकत ना हो.. स्पर्धेसाठीच्या लेखासाठी शब्द मर्यादा आहे. त्यामुळे या प्रकाराबद्दल पुन्हा कधीतरी..

– – – तर आज इतकंच —थांबायचं कुठे हे कळणं, हा तर हुशारीचा फार महत्वाचा आणि दुर्मिळ प्रकार … जो माझ्याकडे आहे… असो.

©️ सुश्री मंजुषा सुनीत मुळे 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ “वाचाल तर वाचाल…” ☆ श्री कौस्तुभ परांजपे ☆

श्री कौस्तुभ परांजपे

? विविधा ?

☆ “वाचाल तर वाचाल…” ☆ श्री कौस्तुभ परांजपे

वाचाल तर वाचाल, हे कुठेतरी माझ्या वाचण्यात आलं. पण त्याचा खरा अर्थ मला नंतर समजला. वाचाल तर वाचाल यात काय वाचायचं, ते बरोबर वाचलं आहे का, याचबरोबर जे वाचलं, त्याचा अर्थ काय, आणि ते वाचलेलं नक्की कुठे, कधी, आणि कसं वापरायचं हे समजून घेतलं पाहिजे. उगाचच उचलली जीभ आणि लावली टाळ्याला असं करून चालत नाही.

काय झालं, सुंदर अक्षर हा एक दागिना आहे, असं माझ्या वाचण्यात आलं. मी लगेच एका कागदावर एक चांगलं वाक्य लिहीलं. आणि कागद बायकोला म्हणालो बघ तुझ्यासाठी एक दागिना.

कागदाकडे बघत बायकोने एक तुच्छ कटाक्ष टाकला. तसेही आता लग्नाला बरीच वर्ष झाल्याने अशाच कटाक्षाची सवय झाली आहे. हल्ली पूर्वीसारखा… म्हणजे ‘ ‘तसा ‘… कटाक्ष टाकणे कटाक्षाने टाळलं जातं. तेव्हा जाणवणारे कटाक्ष असायचे. आता जाणीव करून देणारे कटाक्ष असतात.

काय लिहीलं आहे इतकं त्या कागदावर… काही अर्थ लागतोय का? … वाचणं आणि वाचलेलं बरोबर लिहीणं यात फरक आहे… एकतर तुम्ही धांदरटपणे वाचलंय, किंवा लिहितांना वाचलेलं दिसत नाही… काय म्हणते मी… काही फरक पडतोय का… या वाक्यात तीने मी काय वाचलंय, आणि काय लिहिलं आहे, यासह माझ्यात पडलेले फरक एका वाक्यात स्पष्ट केले.

शाळेत असतांना परीक्षेत थोडक्यात फरक स्पष्ट करा… असा एक प्रश्न असायचा. आज तोच प्रश्न आम्हाला दोघांनाही विचारला असता तर आम्ही आमच्याच बद्दल थोडक्यात पण विस्तृत स्वरुपात फरक जाणवेल इतके फरक सांगीतले असते.

काय लिहीलं आहे ते जाऊ दे… अक्षर बघ… सुंदर अक्षर हा एक दागिना आहे असं वाचलेलं आठवलं आणि म्हणूनच हा अक्षराचा दागिना खास तुझ्यासाठी… माझा केविलवाणा प्रयत्न…

हा… दागिना… काय करावं… अक्षर तेही सुंदर आणि तुमचं… काही संबंध आहे एकमेकांशी. तुुम्ही चार गोष्टी लिहीलेला कागद दुकानदाराला दिला तर तो कागद हातात धरतो, आणि शेेजारच्या मेडिकल स्टोअर मधल्या माणसाकडून वाचून घेतो. नाहीतर परत देत तुमच्याच कडून वाचून घेतो. तो मेडीकल स्टोअरवाला… त्याला सगळ्यांची अक्षरं समजतात. पण एकदातर तुमचाही कागद त्याने समजत नाही म्हणून परत केला होता… वर नवीनच औषध दिसतयं असा मिश्किल शेराही मारला…

शाळेत चुकीचं ऊत्तर लिहिल्यामुळे शिक्षकांनी काही जणांना गुण दिले नसतील. कारण लिहिलेलं चुकीचं आहे हे त्यांना समजलं असेल. पण तुमचं लिहीणं न समजल्याने व काहितरी बरोबर असेल असा (गैर) समज झाल्याने थोडेतरी गुण पडले असतील. यात माझ्या अक्षराचे सगळे दोष झाकून गुण तेवढे उघडे पडल्याचं लक्षात आलं.

आता मी एक वाक्य सांगते. नवरा हा सुध्दा एक दागिना असतो. आणि दागिना मिरवला जातो. आहे तुमच्यात काही तुम्हाला मिरवण्यासारखं… गणपतीच्या मिरवणूकीत सुध्दा तुम्हाला बोलवत नाही… काय तुमच्या अक्षराचा कागद मिरवायचा.

एकतर तुम्ही कागदावर लिहीलेलं वाक्य ग्रामीण भाषेतलं आहे. आणि चुकीच्या पध्दतीने लिहून तुम्ही त्याचा अर्थच बदलला आहे. काही अर्थ आहे का याला. मग मी तिच्या बोलण्याचा अर्थ लावायचा प्रयत्न केला.

वाक्य होतं “आम्ही बी घडलो, तुम्ही बी घडा ना” आणि मी लिहीलं होतं, “आम्ही बिघडलो, तुम्ही बिघडाना” आता काय… सगळच बिघडलं होतं… पण वाचाल तर वाचाल याचा अर्थ समजला… आणि लिहीण्याचा सुध्दा.

©  श्री कौस्तुभ परांजपे

मो 9579032601

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ “Self-deception म्हणजे काय?” ☆ श्री जगदीश काबरे ☆

श्री जगदीश काबरे

☆ “Self-deception म्हणजे काय?☆ श्री जगदीश काबरे ☆

“Self-deception” म्हणजे स्वतःची फसवणूक करणे किंवा स्वतःलाच चुकीचा विश्वास खरा आहे असे पटवून देणे होय. पण हे फक्त नैतिकदृष्ट्या चुकीचे वर्तन नसून, माणसाच्या मेंदूतील ती एक अतिशय गुंतागुंतीची संरक्षण यंत्रणा आहे. जेव्हा सत्य माणसाला भावनिकदृष्ट्या त्रासदायक वाटते, तेव्हा त्याचा मेंदू त्या वेदनेपासून स्वतःला वाचवण्यासाठी खोट्या विश्वासांची निर्मिती करतो. म्हणजेच, मेंदूचा एक भाग सत्य जाणतो, परंतु दुसरा भाग ते नाकारतो. ही प्रक्रिया इतकी सूक्ष्म असते की, व्यक्तीला स्वतःलाही समजत नाही की, तो स्वतःलाच फसवत आहे.

मानवाच्या मेंदूत प्रिफ्रंटल कोर्टेक्स, अमिंग्डाला आणि इंटेरियर सिंग्युलेट कोर्टेक्स हे भाग वस्तुस्थिती तपासणे, भावनांचे नियमन करणे आणि आत्मसन्मान टिकवणे यासाठी जबाबदार असतात. जेव्हा एखादे सत्य आपल्या स्वप्रतिमेला धक्का देणारे असते, तेव्हा अमिंग्डाला मेंदूला भावनिक धोक्याचा सिग्नल देते. त्यामुळे प्रिफ्रंटल कोर्टेक्सचा तर्कशक्तीवरील प्रभाव कमी होतो. या अवस्थेत माणूस तर्क बाजूला ठेवून स्वतःलाच खोटा विश्वास देतो, जसे की “मी काही चुकीचे केले नाही” किंवा “मी अपयशी नाही, परिस्थितीच चुकीची होती. ” त्यामुळे मेंदूतील तात्पुरता भावनिक तणाव टाळला जातो. पण हीच सवय दीर्घकाळ सुरू राहिली तर ती माणसाला वास्तवापासून भरकटवते आणि स्वतःला भ्रमाच्या जाळ्यात अडकवते.

मानसशास्त्रज्ञ रॉबर्ट ट्रिव्हर्स यांनी या प्रक्रियेचा उत्क्रांतीदृष्ट्या अभ्यास केला आहे. त्यांच्या मते, स्वतःला फसवणे ही माणसाची जीव रक्षणासाठी विकसित झालेली युक्ती आहे. जर आपण आपल्याबद्दल एखादी गोष्ट खरी समजून सांगितली, तर ती सांगताना आपल्यामध्ये खोटेपणाची चिन्हे दिसत नाहीत. त्यामुळे इतरांना फसवताना आपण अधिक आत्मविश्वासपूर्ण, खात्रीशीर आणि प्रभावीपणे फसवायला लागतो. मग समाजात काही प्रमाणात स्वतःची फसवणूक करणे हेच त्याला सामाजिक अस्तित्वासाठी उपयुक्त वाटू लागते.

फ्रॉईडच्या मनोविश्लेषणानुसार, स्वतःची फसवणूक ही ego defense mechanism म्हणजे अहंकाराचे संरक्षण करणारी प्रक्रिया आहे. ती माणसाला अपराधभाव, भीती, अपयश आणि आत्मनिंदा यांपासून वाचवते. उदाहरणार्थ, एखादा विद्यार्थी नापास झाल्यावर म्हणतो, “मी अभ्यास केला असता तर नक्की पास झालो असतो. ” तो प्रत्यक्षात अभ्यास करत नाही, पण असे म्हणणे त्याला आत्मसन्मान टिकवण्यासाठी आवश्यक वाटते. तसेच एखादी व्यक्ती प्रिय व्यक्तीच्या वागण्यामुळे दुखावली गेली तरी स्वतःला समजावते की, “ती व्यक्ती व्यस्त आहे, म्हणून माझ्याकडे दुर्लक्ष करते आहे, ती काही रागावलेली नाही. ” हे तर्क खोटे असले तरी माणसांमध्ये भावनिक संतुलन राखण्यासाठी उपयोगी ठरतात.

वैज्ञानिकांनी Functional MRI तंत्राचा वापर करून असे सिद्ध केले आहे की, जेव्हा माणूस स्वतःलाच खोटा विश्वास देतो, तेव्हा मेंदूतील बक्षीस देणारी यंत्रणा म्हणजेच अधोस्ट्रायटम सक्रिय होते. त्यामुळे हा खोटा विश्वासही मेंदूला सुखद वाटतो. म्हणजेच सत्य टाळणे मेंदूसाठी थोडा वेळ आरामदायी ठरते. परंतु कालांतराने ही अवस्था कॉग्नेटिव्ह डीसओनन्स निर्माण करते, म्हणजेच त्यावेळी मनात दोन परस्परविरोधी विचार एकाच वेळी सक्रिय असतात, एक विचार सत्य दाखवत असतो तर दुसरा विचार दुसरा असत्य वा खोटेपणा. या विसंगतीमुळे व्यक्ती गोंधळते, अस्वस्थ होते आणि आत्मभ्रमित होते.

अनेक माणसांमध्ये त्यांनी केलेली स्वतःची फसवणूक आपल्याला अनेक स्वरूपात दिसते. काहीजण पूर्णपणे सत्य नाकारतात, काहीजण चुकीचा तर्क लावून आपल्या म्हणण्याला योग्य ठरवतात, काहीजण स्वतःच्या कमतरता इतरांवर ढकलतात, तर काहीजण फक्त आपल्याला सोयीस्कर असेल अशीच माहितीच स्वीकारतात. या सर्व प्रकारांमध्ये एक समान धागा आहे, तो म्हणजे सत्य टाळून स्वतःचे भावनिक रक्षण करणे. ह्यालाच वैज्ञानिक भाषेत “self-deceptive bias” म्हणजे स्वतःलाच फसवण्यासाठी केलेला युक्तिवाद असे म्हणतात.

या प्रक्रियेचे सामाजिक आणि वैयक्तिक दोन्ही परिणाम होतात. अल्प प्रमाणात स्वतःची फसवणूक मानसिक स्वास्थ्यासाठी उपयुक्त ठरते, कारण ती आपल्याला भावनिक आघातांपासून वाचवते आणि आत्मसन्मान टिकवते. पण जास्त प्रमाणात ती हानिकारक ठरते. सतत स्वतःलाच खोटा विश्वास देणारा माणूस वास्तवापासून तुटतो, स्वतःच्या चुका दुरुस्त करत नाही आणि नात्यांमध्ये अप्रामाणिकपणाने जगू लागतो. परिणामी, त्याचे निर्णय चुकीचे ठरतात, आत्मविकास थांबतो आणि सत्याशी असलेले नाते कमकुवत होते.

अशी माणसे अर्धवट ज्ञानामुळे अर्ध्या हळकुंडाने पिवळी होत आपण अगाध ज्ञानी झालेलो आहोत असे समजत स्वतःलाच फसवू लागतात. तसेच एखादे सामान्यीकरण केलेले विधान आपल्यालाच उद्देशून केले आहे असे समजून ते थयथयाट करू लागतात. यावरून हे स्पष्ट होते की, “Self-deception” म्हणजे केवळ स्वतःची फसवणूक नव्हे, तर मेंदूची एक जटिल भावनिक आणि संज्ञानात्मक प्रक्रिया आहे. ती माणसाला तात्पुरता मानसिक आराम देते, पण ती सत्य नाकारण्याची सवय लावू शकते. या प्रक्रियेचा योग्य वापर म्हणजे स्वतःला भावनिकदृष्ट्या सावरणे, वास्तवाचे भान न हरवणे. जेव्हा आपण स्वतःविषयीचे खोटे वलय नाकारून आणि सत्य स्वीकारून त्यावर उपाय शोधतो, तेव्हाच आपण स्वतःची खरी प्रगती साधतो. अशा प्रकारे स्वतःची फसवणूक ही माणसाच्या मानसिक उत्क्रांतीचा भाग असली तरी तिच्यावर नियंत्रण ठेवणे हेच खऱ्या अर्थाने बौद्धिक प्रामाणिकतेचे लक्षण आहे.

*

© श्री जगदीश काबरे

मो ९९२०१९७६८०

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ जागा!! ☆ श्री प्रमोद वामन वर्तक ☆

श्री प्रमोद वामन वर्तक

? विविधा ?

🙏 जागा! 😅 श्री प्रमोद वामन वर्तक ☆

*

हृदयी जागा तू अनुरागा

प्रीतीला या देशील का

*

हे शांता शेळके यांनी लिहिलेलं आणि लताबाईंनी गायलेलं भावगीत कितीही जुन झालं, तरी माझ्या पिढीतील लोकांच्या मनांत अजूनही रुंजी घालत आहे. आता माझ्या पिढीतील म्हटल्यावर, इथं मी माझं वय सांगणं अपेक्षित आहे, पण ते सांगण्याची ही जागा नाही! बायकांनी आपलं वय लपवू नये असा जरी खरा-खोटा अलिखित दंडक असला, तरी तो पुरुषांना लागू नाही असं म्हणतात (कोण ते माहित नाही! ) तरी माझं वय सांगण्याची घाई मी या जागी नक्कीच करणार नाही मंडळी!

तर त्या भावगीतात म्हटल्या प्रमाणे त्या गाणाऱ्या नायीकेची आपल्या प्रियकराकडून जागेच्या बाबतीत त्या काळी किती माफक अपेक्षा होती बघा! ती फक्त त्याच्या हृदयात जागा मागत्ये, आत्ताच्या लग्नाळू मुलींसारखी ३ बीएचके असेल तरच तुझ्याशी लग्न करीन, असं म्हणायचं धाडस तेव्हाच्या मुलीत नव्हतं! किंबहुना २- ३ बीएचके ही जागेच्या बाबतीतली कन्सेप्टच त्याकाळी अस्तित्वात नव्हती! चाळीतली एखादी जिन्याखालची सिंगल रूमची जागा, ज्या जागेत धडपणे उभं सुद्धा राहता येणार नाही अशी जागा सुखाचा संसार फुलवायला पुरेशी होती! कारण तेंव्हा जागा कितीही मुबलक असल्या तरी खिशात नगद नारायणाचा ठणठनाट! त्यामुळे मिळेल त्या इतकुश्या जागेत सुद्धा अनेकांचे संसार नेटाने आणि आनंदाने फुलत होते. नुसते फुलत नव्हते, तर आपण आता गिरगांव किंवा दादरच्या एखाद्या चाळीतल्या सुखवस्तू जागेत रहायला आल्यावर, गावात असलेल्या आपल्या नातेवाईकांना सुद्धा आपल्याच चाळीत एखादी जागा कशी मिळेल, याच विचारात मग घरचा कर्ता पुरुष असायचा आणि त्या कर्त्या पुरुषाच्या त्या विचाराला, त्या घरातली कर्ती बाई मनापासून दाद देत सर्वार्थाने मदत करायची. हे असं सगळं तेंव्हा असायचं कारण म्हणजे रहायची जागा कितीही लहान असली, तरी सगळ्यांच्या हृदयात आपल्या माणसांसाठी खूप मोठी जागा होती! आणि आता…..   ४ बीएचके असला तरी, कोणी पै पाहुणा येणार म्हटल्यावर आपली बेडरूम त्यांच्या बरोबर कोणी शेअर करायची यावरून घरात भांडण होण्या पर्यंत मजल जाते. काही माणसांची रहायची जागा कितीही मोठी असली तरी त्यांच्या ह्रदयात चार दिवसासाठी आपल्याकडे येणाऱ्या जवळच्या नातलगांसाठी तसूभर सुद्धा जागा उरली नाही, हे आजच एक कटू वास्तव आहे!

जागा मग ती कुठलीही असो, ती मानवाला नेहमीच कमी पडत आलेली आहे, हे त्रिवार सत्य आहे! म्हणजे चाळीत रहाणारा जरा सधन झाल्यावर वन रूम किचन का होईना पण फ्लॅट घ्यायचा ध्यास घेतो. मग वन नंतर टू, थ्री, फोर…..   जसा खिसा मोठा तशी जागा! काही काही धनाढ्य लोकांच्या स्वप्नांना इतके पंख फुटतात की तो फक्त चार पाच लोकांच्या संसारासाठी एक सत्तावीस मजली राजवाडासदृश इमारतच बांधतो!

जागा हा शब्दच जणू माणसाच्या पाचवीला पूजलेला आहे. म्हणजे असं बघा मंडळी, त्याच्या जन्माच्या आधी होणाऱ्या आईच नांव एखाद्या नर्सिंग होम मध्ये घालून येणाऱ्या बाळाची जागा तिथे बुक करावी लागते, म्हणजे आयत्यावेळी उगाच धावपळ नको! हे असे बाळावर त्याच्या जन्माच्या आधीपासून जागेबाबत झालेले संस्कारच त्याला पुढील संपूर्ण आयुष्यात उपयोगी पडतात, असं माझं तरी ठाम मत आहे बुवा! म्हणजे बाळ थोडं मोठं झाल्यावर, आई वडील नोकरीला जाणार, मग बाळाला दिवसभर सांभाळण्यासाठी एखाद्या चांगल्याशा, घराजवळ असलेल्या पाळणाघरात जागा बघा. ते आणखी थोडं मोठं झाल्यावर घराजवळच्या इंग्लिश मिडीयमच्या शाळेत कधी ओळख काढून, कधी डोनेशन देऊन जागा मिळवा. आता बाळाचा बाळ्या झाल्यामुळे त्याला दाढी मिशीबरोबर थोडी जास्तच अक्कल आलेली असते, त्यामुळे मी जाईन तर अमुक तमुक कॉलेजला नाहीतर मला पुढे शिकायचंच नाही असा हट्ट तो करू लागतो. मग त्याच्यावरील प्रेमापोटी त्याची लायकी नसतांना मॅनेजमेंटच्या कोट्यातून(? ) त्याच्यासाठी त्या कॉलेजला सीट (जागा) मिळवली जाते!

शिक्षण पूर्ण करून मग नोकरी मिळाल्यावर ट्रेन मध्ये चौथी जागा मिळवण्यासाठी करावी लागणारी धडपड, कधी कधी त्यासाठी कारशेड पर्यंत करावा लागणारा प्रवास, नोकरीतल्या अस्थिर वातावरणात आपली जागा पक्की करण्यासाठी करावे लागणारे लांगूलचालन! एक ना अनेक प्रकारे मी सुरवातीला म्हटल्याप्रमाणे, बाळावर त्याच्या जन्माधीपासून झालेले जागे बाबतचे संस्कार, त्याला असे पुढील आयुष्यात उपयोगी पडतात!

जागेच महात्म्य अगदी आपण रोज कुठे झोपतो इथपासून सुरु होतं. खरं नाही वाटत? मग जरा आठवून बघा, कधीतरी तुमची रोजची झोपायची जागा जरी बदलली तरी निद्रादेवी निदान काहीकाळ तरी तुमच्यावर रुसून बसते की नाही? इतकी सवय आपल्याला त्या जागेची झालेली असते हे ही तितकंच खरं.

आता टू व्हीलर म्हटली की ती फक्त दोन माणसांनी एकामागे एक असलेल्या सीटवर बसून, पुढच्या व्यक्तीने चालवायची, असा आपला समज! पण तो समज हल्ली सर्रास पायदळी तुडवला जातोय हे आपण सगळेच नाईलाजाने आणि उघड्या डोळ्यांनी बघतोय. बरं अशा एखाद्या ३-४ माणसं घेऊन जाणाऱ्या कसरतपटूला तुम्ही चार गोष्टी सांगायला गेलात, तरी त्याच्या मेंदू नसलेल्या डोक्यातील रिकाम्या जागेत ते शिरेल याची खात्री नाही. पण मंडळी तुम्हाला सांगतो, अशाच एका बाईक स्वाराला बघून स्व. रतन टाटा यांच्या कल्पक मेंदूत फक्त एक लाख किंमत असलेली “न्यानो” फोर व्हीलर बनवण्याची कल्पना स्फूरली व त्यांनी ती प्रत्यक्षात आणून अनेक मध्यम वर्गी्यांचे गाडी घेण्याचे स्वप्न पूर्ण करून, त्यांच्या हृदयात स्वतःसाठी एक वेगळीच जागा निर्माण केली, हा इतिहास तसा ताजा आहे!

मंडळी माझ्या हृदयात एक जागा मी एका माणसासाठी राखून ठेवली आहे. आपण विचाराल कोण तो माणूस? सांगतो सांगतो. आपण सगळ्यांनीच कधीतरी एसटीने प्रवास केलेला असेल. तर एसटी स्थानकात एसटी थांबल्या थांबल्या खिडकीच्या दांड्याला एका हाताने लटकून दुसऱ्या हाताने आपला रुमाल आत टाकून, जागा अडवण्याची क्लूप्ती ज्याच्या डोक्यातून आली त्या माणसाला मला भेटायची फार म्हणजे फारच इच्छा आहे मंडळी. मला तर वाटतं कमी अधिक फरकाने एखाद्या फुकटच्या कार्यक्रमात आपल्या पत्नीसाठी किंवा मित्रासाठी बाजूच्या रिकाम्या खुर्चीवर रुमाल किंवा आपली बॅग ठेवून जागा अडवायची या आयडियेचा तोच बहुदा प्रणेता असावा, अशी मला खात्री आहे!

मुबंईसारख्या ठिकाणी भीक मागणाऱ्या लोकांची रोजची बसायची जागा सुद्धा ठरलेली असते, हे मी काही नव्याने सांगायला नको. आणि ती आपली जागा ही जणू आपलीच जहागिरी आहे अशा थाटात तो भिकारी वावरत असतो. मध्यंतरी मी पेपरला एक बातमी वाचली होती, एका भिकाऱ्याने त्याच्या जागेवर दुसऱ्या भिकाऱ्याने येऊन भीक मागितली म्हणून त्याच्यावर प्राणघातक हल्ला केला होता.

“मानलं बुवा साहेबांना, त्याला त्यांनी पक्षातली त्याची जागा आपल्या भाषणातून काय दाखवून दिली, खरंच कमाल आहे साहेबांची! ” हे असले संवाद आपण कुठल्याही पक्षाच्या आतील गोटात असाल तर नक्कीच ऐकायला येतील. आपल्या भाषणातून किंवा कृतीतून कोणाला तरी कधीतरी त्याची खरी जागा दाखवून द्यायला फार पूर्वी लोकांना आवडायचं. पण हल्ली तेवढी प्रगल्भ भाषा ना नेत्यांच्या ना सामान्य माणसाच्या मुखातून बाहेर येते. हल्ली भांडणाच्या जागेवरच स्वतःच्या कुवती नुसार आपल्या प्रतिस्पर्ध्याला त्याची जागा दाखवली जाते!

मुंबईकर आणि जागा यांचा एक अतूट संबंध आहे मंडळी. हां आता खरे मुंबईकर कोणाला म्हणायचं यावरून वाद नक्कीच होऊ शकतो, कारण मुंबई ही एक भली मोठी गुळाची ढेप म्हटल्यावर साऱ्या देशातून निरनिराळे काळे लाल मुंगळे त्या ढेपेत आपापली जागा निर्माण करण्यासाठी त्या ढेपेला डसू लागल्यावर मुंबईचे असे हाल होणार हे स्वाभाविकच आहे. मग तिच्या विस्तारासाठी समुद्राला मागे हटवून नरिमन पॉईंट सारखी जागा निर्माण करण्यात आली. पण ती जागा सुद्धा कमी पडत्ये असं लक्षात आल्यावर नवी मुंबई निर्माण करून अधिक जागेची निर्मिती करण्यात आली. पण मानवाची जागेची भूक थांबायचं काही नांव घेत नाही, त्यामुळेच आता तिसरी मुंबई निर्माण करून अधिक जागा निर्माण केली जाणार आहे, आता बोला!

आता तर पृथ्वीवरची जागा कमी पडत्ये म्हणून की काय मानव चंद्रावर आणि मंगळावर वस्ती करण्याची स्वप्नं बघू लागला आहे! अर्थात स्वप्न बघण्यासाठी कोणाला कुठल्याच जागेची अडचण असण्याचा प्रश्नच नाही, पण हे स्वप्नरंजन करत असतांना आपल्यावर राज्य करणाऱ्या निसर्गाचा मानवाने जरा तरी विचार करावा, नाहीतर अधिक जागा मिळवण्याच्या मानवाच्या प्रयत्नांना तो मानवाची या पृथ्वीवरील योग्य ती जागा दाखवण्यास पुढे मागे बघणार नाही हे ही तितकच खरं!

मला असं मनापासून वाटत की प्रत्येकानेच स्वतःच्या चांगल्या वागणुकीने, जमेल तशी जमेल तेंव्हा इतरांना मदत करून लोकांच्या हृदयात स्वतःसाठी एक छोटीशी का होईना पण कायमची एक जागा निर्माण करायचा प्रयत्न आयुष्यभर करत रहावा!

शेवटी, माणूस कितीही धनाढ्य असला, अगदी जगातील सर्वात श्रीमंत असला तरी त्याला त्याच्या मृत्यूनंतर फक्त तीन बाय सहाची जागा पुरते, हे जेंव्हा त्याला उमगेल तो खरा सुदिन म्हणायचा! बघा पटतंय का?

शुभं भवतु!

© प्रमोद वामन वर्तक

संपर्क – दोस्ती इम्पिरिया, ग्रेशिया A 702, मानपाडा, ठाणे (प.) ४०० ६१०

मो – 9892561086 ई-मेल – pradnyavartak3@gmail.com

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ ‘साद-प्रतिसाद-दाद!’ ☆ श्री दिवाकर बुरसे ☆

श्री दिवाकर बुरसे

🌸 विविधा 🌸

☆ ‘साद-प्रतिसाद-दाद!’ ☆ श्री दिवाकर बुरसे

कोणी साद घातली तर प्रतिसाद द्यायला हवा. कुणी प्रतिसाद दिला तर आभार मानायला विसरू नये. याला संवाद म्हणता येईल. सुसंवादासाठी साद-प्रतिसाद-दाद-धन्यवाद यामधे सातत्य असावे.

एखाद्याच्या कलाप्रदर्शनाला रसिकांनी -दर्शक, प्रेक्षक, श्रोत्यांनी -दाद देणे फार महत्त्वाचे असते. कलानिर्मितीमागे कलाप्रदर्शन अंतर्भूत आहेच. ‘कलेसाठी कला’, ‘स्वान्तसुखाय कला’ हे म्हणणे सत्य नाही. कलाविष्कारासाठी कलाकार आणि कलाकृतीचा रसस्वाद घ्यायला रसिक हवेतच. रसिकांखेरीज कला व कलाकृती अपूर्ण आहेत. म्हणून कलाकाराला व त्याच्या कलाकृतीला रसिकांचा रसरशीत प्रतिसाद आवश्यक आहे. कोणत्याही कलाप्रदर्शनाला भरभरून दाद द्यायला हवी. दाद देणे हे जिवंतपणाचे, जिंदादिलीचे लक्षण आहे! कलाकार अशा जिंदादिल रसिकासाठी हापापलेला असतो मित्रहो.

जेव्हा जेव्हा तुम्हाला एखाद्याची एखादी गोष्ट आवडेल, त्या त्या क्षणी तात्काळ त्या माणसाला लगेच सांगा. व्यक्त व्हा, त्याचे कौतुक करा, त्याला दाद द्या. अशी दाद कधी शब्दाने, कधी कटाक्षाने, कधी स्पर्शाने तर कधी एखाद्या स्मिताने देता येते.

एखादी कविता, तुम्हाला आवडलेले एखादे चित्र, एखाद्या फुलाचा वास, बायकोची नवी साडी, एखादी रंगलेली मैफिल, एखाद्याचा फोटो, पहिल्या पावसाचा गंध, नव्या पुस्तकाचा वास, ओली भेळ, कांदा भज्यांचा किंवा बटाटेवड्याच्या तळण्याचा रसना चाळवणारा खमंग वास इ. इ. इ. जे जे आवडेल त्याला मोकळेपणे दाद द्या.

आपण दररोज किती तरी गोष्टी करत असतो. कितीतरी घटना, व्यक्ति पहात असतो, अनुभवत असतो. कधी त्या गोष्टी आपल्याला आवडतात, भावतात, आनंद देतात. पण त्याविषयी आपण सहसा कोणाला काही सांगतच नाही. मी काय म्हणतो, एकदा संबंधिताला सांगून तर पहा. त्याचं कौतुक करून तर पहा. आहो, याने त्याला आनंदच होईल आणि तुम्हालाही.

मला सवय आहे. माझी बायको खरेच सुगरण आहे. तिने केलेली प्रत्येक पाककृती रुचकर असते. (हे दांभिकपणे नाही, मनापासून सांगतोय बरं का! ). तिने सिद्ध केलेल्या रोजच्या पोळी-भाजीचा पहिला घास घेताना ती माझ्याकडे अपेक्षेने पहाते. मुखी तो प्रथम सुग्रास पडताच जेव्हा मी तिला म्हणतो, ” वा! क्या बात है! ” तेव्हा ते ऐकून ती सुखावते, हसते आणि मग स्वतः जेवायला वाढून घेते. खूप समाधान दिसते तिच्या मुद्रेवर. जरा अलंकारिक पद्धतीने सांगायचे झाल्यास मी म्हणेन, अशा वेळी जर स्वतः साक्षात् समर्थांनी विचारले, “जगी सर्व सुखी असा कोण आहे रे? ” तर मी नक्कीच हात आणि हातातला सुग्रास वर करून म्हणेन “मी”!

कधी कधी कलाकार एवढा मोठा असतो की त्याला आपण दाद देणे म्हणजे सूर्याला कंदिल दाखवण्यासारखे असते. म्हणून आपण काहीच प्रतिक्रिया देत नाही. पण हे योग्य नाही. कलाकार मोठा असला तरी तुम्ही दाद द्या. कलाकार तिच्या प्रतिक्षेत असतो. दाद न देणे म्हणजे कलाकाराच्या कलेची प्रतारणा आहे.

आपण एखादी सुंदर कविता किंवा लेख वाचतो, तो आपल्याला आवडतोही पण आपण ते कवीला किंवा लेखकाला सांगत नाही, सांगायचे विसरून जातो किंवा टाळतो. एखादे गीत काळजाचा ठाव घेते पण त्याला साधी दाद न देण्याने आपण आपल्या कृपणतेचेच प्रदर्शन करतो.

मी अनुभवाने सांगतो, कलाकार कितीही मोठा झाला तरी त्याला दाद हवीहवीशी वाटते. अगदी लतादिदी, आशाताई, माधुरी दीक्षित, रेखा, कुमार गंधर्व, भीमसेन जोशी, प्रभा अत्रे इ. सारख्या अनेक कलाकारांनी त्यांच्या या व अशा अर्थाच्या भावना प्रकट मंचांवरूनही व्यक्त केल्या आहेत अनेकवेळा.

शेरोशायरी, गझल यात दोन वाक्यांचा एक शेर असतो. हा त्या काव्यप्रकाराचा आकृतिबंध आहे. दोन ओळीनंतर शेर, गझल आवडली तर दाद द्यायची असते हे सांगावे लागते यासारखे दुर्दैव नाही. शायरी, गझल ऐकताना लोक निर्विकार चेहऱ्यांनी बसलेले असतात हे पाहून मला नेहमीच आश्चर्य वाटते. लोकांच्या रुक्षतेचे वाईट वाटते. प्रसिद्ध शायर अँड. भाऊसाहेब पाटणकर तर आपल्या मैफिलीच्या आरंभीच श्रोत्यांना म्हणायचे,

दोस्तहो, मैफील आपुली रंगण्या जर का हवी

आम्हा नको सौजन्य, तुमची जिंदादिली नुसती हवी।

ऐसे जरी नक्कीच घेऊ तुमच्या मुखाने वाहवा

ती ही अशी, ज्या वाहवाला द्यावी आम्हीही वाहवा! ।।

पु. ल. देशपांडे आणि वसंतराव देशपांडे पूर्वी एकत्र गायनाचे कार्यक्रम करायचे. त्यात बऱ्याच वेळा पुल गायचे आणि वसंतराव तबल्याची साथ करायचे.

ते दोघे एके ठिकाणी मैफिल करण्यासाठी, गाणे सादर करण्यासाठी गेले होते. चांगली उच्चभ्रू, धनिक, श्रीमंत श्रोतेमंडळी मैफिल ऐकायला जमली होती. या मैफिलीत वसंतराव गाणार होते.

मैफल सुरू झाली. दहा-पंधरा मिनिटे झाली तरी वसंतरावांच्या एकही आलापीला, तानेला, समेवर येण्याला श्रोत्यांकडून ना दाद ना प्रतिक्रिया ना टाळी. सगळी मंडळी मठ्ठपणे, पुतळ्यासारखी बसून होती. असा प्रतिसादशून्य श्रोतागण समोर आहे हे लक्षात येताच वसंतरावांनी पुलं कडे पाहिले आणि हळूच म्हटले, ” पी एल आज रियाजच करून घेऊ. मनसोक्त.”

एवढ्यात अगदी मागच्या कोपऱ्यातून, “वाह, बहुत खूब, बहुत अच्छे! ” अशी सणसणीत दाद आली. पुलंनी दाद देणाराकडे चमकून पाहिले तर काय, सकाळी त्यांना स्टेशन वरून घेऊन येणारा तो टांगेवाला होता! पुलंना एवढा आनंद झाला, वाळवंटात पाण्याचा झरा दिसावा तसा! त्यांनी त्या माणसाला सन्मानाने पुढे येऊन बसायला सांगितले. पुढची सारी रात्र त्या एकट्या माणसासाठी मैफल रंगवली कारण दिलखुलास दाद देणारा तो एकच रसिकराज मैफिलीत उपस्थित होता!

एखाद्याच्या पाठीवर हात ठेवून त्याला प्रोत्साहन द्या अन् बघा त्याचा चेहरा किती खुलतो ते. लहान मुलांना तर प्रोत्साहनाची खूप आवश्यकता असते. बालवयात यथोचित कौतुक झाले नाही, वेळीच दाद मिळाली नाही तर मुले हिरमुसली होतात. येवढेच नव्हे तर त्यांच्या मनात न्यूनदंड निर्माण होतो. त्या कळ्या अवेळीच सुकू लागतात. मुलांचेच काय मोठ्यांचेही असेच असते. प्रत्येकाला स्तुती प्रिय असते. ती माणसाची मानसिक गरज आहे.

वास्तविक आपल्या सगळ्यांनाच कौतुक, स्तुती, प्रिय वाटते. आपल्या कृतीवर इतरांनी दिलेली दाद हवीशी वाटते. त्याने आपण उत्साहित व प्रोत्साहित होतो. त्यातूनच अधिक उत्तम काम करण्याची ऊर्जा मिळते, प्रेरणा मिळते. जसे आपल्याला वाटते तसेच इतरांना, विशेषतः कलाकारांना वाटत असते. दाद न मिळाल्यास कलावंत निरुत्साही होतो, व्यथित, निराश, उद्विग्न होतो.

प्रतिसादशून्य, अरसिकांविषयी संस्कृत कवी भवभूति काहिशी अशीच भावना पुढील श्लोकातून मांडतो….

इतरतापशतानि यदृच्छया

वितर तानि सहे चतुरानन l

अरसिकेषु कवित्वनिवेदनं

शिरसि मा लिख मा लिख मा लिख।।

भावार्थ:-

इतर ताप शतानी खुषाल दे बा चतुरानना

परि, अरसिकास कवित्वनिवेदन नको लिहू भाळी, नको लिहू, नको लिहू!

म्हणून दुसऱ्याचं कौतुक करा, करायला शिका. दाद द्या, दाद द्यायला शिका.

कलावंत आपल्या कलाकृती सादर करून तुम्हाला साद घालीत असतात, ‘या आणि पहा माझा प्रतिभाविलास’. बेगम परविन सुलताना पुण्याच्या ‘सवाई गंधर्व संगित महोत्सवा’त गंगाधर महांबऱ्यांचे एक मराठी गीत अवश्य सादर करतात, ‘रसिका तुझ्याचसाठी मी एक गीत गाते. ‘ हे गीत त्या गातात वाहवा करणाऱ्या जिंदादिल रसिकांसाठी!

मित्रहो, आपणही इतरांना उत्फूर्त प्रतिसाद द्या. ‘साद-प्रतिसाद-दाद’ हे आदान-प्रदान अखंड चालू ठेवा. त्याने आपले तसेच इतरांचेही जीवन समृद्ध होईल, आनंदमय होईल.

अखेर येवढीच विनंती की, जर आपल्याला हा लेख आवडला, यातले विचार पटले तर नक्की दाद द्या. मी वाट बघतोय आपल्या प्रतिसादाची.

🙏🏼🙏🏼🙏🏼

©️दिवाकर बुरसे, पुणे

संपर्कः ९२८४३००१२५, ९५५२६२९२४५

🌼🌼

याच अभिप्रायाची आरती प्रभू यांची एक कविता आठवते…

ही निकामी आढ्यता का? दाद द्या अन्‌ शुद्ध व्हा

सूर आम्ही चोरतो का? चोरिता का वाहवा।।१।।

*

मैफिलीची साथ आम्हा दैवयोगे लाभली

न्या तुम्ही गाणे घराला फूल किंवा पाकळी।।२।।

*

दाद देणे हे ही गाण्याहून आहे दुर्घट

गुंफणे गजरे दवाचे आणि वायुचे घट।।३।।

*

नम्र व्हा अन्‌ सूर जाणा जीवघेणा रंग हा

साजरा उधळून आयु हो करावा संग हा।।४।।

*

चांदणे पाण्यातले की वेचिता येईल ही

आणि काळोखात पारा ये धरू चिमटीत ही।।६।।

*

ना परंतु सूर कोणा लाविता ये दीपसा

सूर नोहे तीर कंठी लागलेला शापसा।।७।।

आरती प्रभू

🙏🏻

© श्री दिवाकर बुरसे

पुणे

संपर्कः ९२८४३००१२५, ९५५२६२९२४५

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ “डोक्यावर पडलाय…” ☆ श्री कौस्तुभ परांजपे ☆

श्री कौस्तुभ परांजपे

? विविधा ?

☆ “डोक्यावर पडलाय…” ☆ श्री कौस्तुभ परांजपे

काही वाक्यांचा अर्थ कसा निघतो नं……. डोक्यावर पडलाय….. हे वाक्य सहज जरी ऐकलं तरी आपण थोडा विचार करतो, आणि असं समजतो कि वातावरण थोडंस तापलेलं आहे, आणि काहीतरी चूक झालेली आहे.

पण एखादा खरोखरच पडला असेल, आणि त्यावेळी डोक्याला अगदीच थोडसं लागलं असेल. म्हणजेच गंभीर नसेल व नंतर सगळं वातावरण निवळल्यावर हेच वाक्य म्हटलं तर….. त्यावेळी या वाक्यामुुळे गंमत तर होतेच. पण गमतीतही नंतर ते वाक्य कायम वापरायचा अधिकार मिळतो.

काय झालं,….. आम्ही मित्रमंडळी आपापल्या कुटुंबासह पावसाळी सहलीसाठी एक दिवस बाहेर फिरायला गेलो होतो. काही देवस्थानं पाहण्यासाठी ही सहल होती.

तिथे पोहोचल्यावर देेवदर्शन झाल्यावर, निसर्ग सौंदर्य बघत चेष्टा, थट्टा, मजा, खाणं अशा सहलीत अपेक्षित आणि हव्या असलेल्या सगळ्यागोष्टी खेळीमेळीने सुरु होत्या. त्याच वेळी एका ठिकाणी झाडाच्या आडव्या असलेल्या फांदीवर सगळ्यांनी बसून फोटो काढावा असं ठरलं. जमीनीवरच पाय टेकवून सगळ्यांंना सहज बसता येईल इतकी खाली ती फांदी होती. फांदी कसली खोडचं होत ते.

या फांदीवर बसून फोटो काढून झाल्यावर माझा आणि एका मित्राचा एकमेकांना धक्का लागला. आणि हा धक्का लागल्यावर मी त्या आडव्या फांदीसमोरच जमीनीवरच आडवा झालो. मी आणि फांदी यात खालच्या बाजूला जास्त कोण आडवा होऊ शकतो याची जणूकाही स्पर्धाच लागली होती. स्पर्धा मीच जिंकली. पडला म्हणजे पराभव झाला असं आपण म्हणतो. पण इथे आडवं होण्यात मीच आडवा झालो, म्हणजे पडलो तरी जिंकलो होतो. सुदैवाने मी आडवा होत असतांना कोणी मधे आलं नाही. नाहीतर त्याला सुुध्दा नाईलाजाने आडव्या हातानेच घ्यावं लागलं असतं.

पडतांना मी आधी खांद्यावर पडलो, आणि मग डोकं आपटलं. डोक्यावरचा भार खांद्यावर याचा अनुभव मी पडता पडता घेतला.

पडल्यावर थोडावेळ वातावरणात गंभीरपणा आला होता. रेेल्वेेस्टेेशनवर जशी एकामागूून एक माहिती व सुुचना ऐकू येतात त्याच पध्दतीने, अरे ऊठवा त्याला,…. थोडावेळ बसू द्या,…. पाणी द्या,…

गर्दी करु नका,….   मोकळी हवा येऊ द्या…… अशी अनेक काळजी घेणारी वाक्यं पटापट ऐकायला आली. यात मला ऊठवून बसवलं केव्हा, आणि ऊभं केलं केव्हा हे लक्षातच आलं नाही.

तेवढ्या गदारोळातसुध्दा पाण्याबरोबर एक पेन कीलरची गोळी माझ्या पोटात विसावली. सहलीत खाण्यापिण्याच्या गोष्टींसोबत आंबटगोड चवीच्या चघळायच्या गोळ्यांबरोबरच अशा डोळे मिटून गिळायच्याही गोळ्या असतात हे काहीवेळा बरं असतं.

कुठून फोटोसाठी त्या आडव्या फांदीच्याफंदात पडलो असाही विचार आला. किंवा त्याला खोड म्हणावं तर खोडावर बसून फोटो काढायची खोड जिरली असं म्हणावं लागेल. पण पडल्यावर काही झालं नाही या बद्दल सगळ्यांनीच समोरच्या देवासह जो देव आठवेल त्याचे आभार मानले. देवाचीच कृपा असं म्हणत घेतलेला प्रसाद परत एकदा खाऊन झाला.

अगोदर घेतलेली पेन किलर आणि आता ग्रहण केलेला प्रसाद या मुळे पडतांना लागलेलं ग्रहण हळूहळू सुटत असल्याच जाणवलं. पण संध्याकाळपर्यंत खांदा आणि हात दुखायला लागला होता.

नंतर पुढची देवस्थान पण पाहिली, पण हाताला काही होऊ देऊ नको, हिच विनंती हात दुखत असतांना हात जोडून केली.

दुसर्‍या दिवशी सकाळी डाॅक्टरांकडे. त्यांना कालचा सगळा प्रसंग सांगितला. ते म्हणाले चला. काल रंगीत फोटो काढलाय, आज आता फक्त हाताचा आणि खांद्याचा काळा फोटो एक्स रे काढू. पण त्या काळ्या फोटोत सुध्दा काही काळेबेरे दिसले नाही.

पण त्या दिवसापासून मी त्याच मित्रांमधे  काय कुठेही काही चुकीचं बोलतोयं असं बायकोला वाटलं तर ती ठामपणे आणि खरं बोलते, मनावर घेऊ नका, ते जरा डोक्यावर पडले होते.

©  श्री कौस्तुभ परांजपे

मो 9579032601

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ तो आणि मी…! – भाग ७७ ☆ श्री अरविंद लिमये ☆

श्री अरविंद लिमये

? विविधा ?

☆ तो आणि मी…! – भाग ७७ ☆ श्री अरविंद लिमये ☆

(पूर्वसूत्र- आज माझ्यासाठी सहस्त्रबुद्धे आजोबांच्या मनाची दारं थोडी कां होईना किलकिली झालेली होती. त्यामुळेच त्यांच्या घरून बाहेर पडताना फारसं काही हाती लागलेलं नसतानाही बरंच कांही गवसल्याचं समाधान माझ्या मनात भरून राहिलं होतं..!)

 पण ते समाधान अल्पजीविच ठरलं. याला निमित्त झालं ते ज्यांच्याविरुद्ध ही तक्रार होती त्या आमच्या ब्रॅंच-मॅनेजर प्रभुदेसाईंचंच. या संदर्भात आम्हा दोघांचं बोलणं झालं होतं, तेव्हा तोवर त्यांच्या मनात कोंडून राहिलेला सहस्त्रबुध्देंबद्दलचा संताप त्यांच्या शब्दाशब्दांतून पाझरत होता. नेमकं काय घडलं होतं ते सगळं प्रभूदेसाई झपाटल्यासारखं सांगत राहिले होते. त्यातून आपोआपच ‘तक्रारदार सहस्त्रबुद्धे’ या व्यक्तीची एक नकारात्मक प्रतिमा माझ्या मनात कोरली गेली होती! म्हणूनच एका अतिशय हेकट, संतापी आणि आतयायी अशा म्हाताऱ्या माणसाला मी भेटायला जातोय याचं भान काल सकाळी त्यांच्या दाराची बेल वाजवताना मी घट्ट धरूनच ठेवलं होतं. या सगळ्या पार्श्वभूमीवर मी अपेक्षित केलेला आक्रस्ताळेपणा त्यांनी दाखवलेला नव्हता हे आश्चर्य वाटावं असंच होतं. शिवाय ते दत्तभक्त आहेत हे त्यांच्या गुरुचरित्र वाचनाच्या संदर्भामुळे माझ्या लक्षात आल्यामुळे निघताना मी कांहीसा समाधानी होतो हे खरं पण ते समाधान मनात सुरू झालेल्या त्या आजोबांबद्दलच्याच उलटसुलट विचारांमुळे जवळजवळ नाहीसंच झालं होतं. मनात गर्दी करू लागलेल्या त्या विचारांमधे मला तीव्रतेनं त्रास देत राहिला तो माझ्या मनात आधीच ठाण मांडून बसलेला सहस्त्रबुद्धे आजोबांचा तो नकारात्मक ठसाच! ती संपूर्ण रात्र या विचारांच्या गदारोळात अधांतरीच गेली. या माणसाकडून फार कांही अपेक्षा करण्यात अर्थ नाही ही स्पष्ट जाणीव मग सकाळपर्यंत अधिकाधिक दृढ होत गेलेली होती!

 अर्थातच अशा मन:स्थितीत निर्माण झालेले विचारतरंग माझी उमेद आणि उत्साह प्रदूषित करणारेच ठरले. ‘त्यांनी प्रभूदेसाईंविरूध्द केलेली ती लेखी तक्रार, सातत्याने त्याचा केलेला शिस्तबध्द पाठपुरावा आणि प्रभूदेसाईंना कठोर शिक्षा होण्यासाठीचा यांचा टोकाचा आग्रह हे सगळं विचारपूर्वक रचलेल्या षडयंत्राचाच एक भाग नसेल कशावरून?’ हा प्रश्न तर माझी पाठच सोडेना. आता ठरल्याप्रमाणं त्यांना भेटायचं तर लगेचच निघायला हवं होतं पण जाऊन करायचं काय?सहस्त्रबुध्दे आजोबांना त्यांचं काय आणि कसं चुकलंय हे सांगायचं कसं? कांही करून त्यांना ती तक्रार मागं घ्यायला लावायचीच ही माझ्यावरची मुख्य जबाबदारी पार पाडणं आणि तेही दोन-चार दिवसांच्या अत्यल्प मुदतीत हे अशक्य कोटीतलंच होतं हे लख्ख जाणवलं आणि मी निराश झालो. अशा बिकट वाटेवर याच अस्वस्थ मनानं मी त्या सकाळी टाकलेलं पहिलं पाऊल म्हणूनच आत्मविश्वास हरवल्यासारखं लटपटत होतं आणि नंतर सहस्त्रबुद्धेंच्या दारावरची बेल वाजवताना माझा हातही थरथरत होता!

 ” या..” माझं स्वागत केलं ते दस्तुरखुद्द सहस्त्रबुध्दे आजोबांनीच. त्यांच्या चेहऱ्यावर ना हसू होतं ना मी आल्याचं समाधान. तरीही त्यांचा चेहरा शांत होता आणि माझ्यासाठी तेच खूप होतं.

 “आज लवकर आवरलं कां गुरुचरित्र वाचन?” मी सहजच विचारलं.

 “नाही. हीच माझी रोजची वेळ. काल अध्याय मोठा होता म्हणून थोडा उशीर झाला होता ” ते म्हणाले. त्यांचा मूड कसा आहे याची एवढी चाचपणी पुरेशी होती.

 “तुम्ही केलेल्या तक्रारी बद्दल मी आवर्जून बोलायला आलोय याचं आश्चर्य वाटलं असेल ना तुम्हाला?” मी फार वेळ न दवडता मुद्यालाच हात घातला.

 “नाही.” माझ्याकडे रोखून पहात ते ठामपणे म्हणाले. “तसंच काही कारण असल्याशिवाय बँक तुम्हाला पाठवणार नाही हे ठाऊक आहे मला.”

 हे ऐकून मी भांबावलोच.हे यांना कसं समजलं? मला प्रश्न पडला. ‘आपल्या ऑफिस मधल्याच कुणाशी संपर्क, साटंलोटं नसेल ना यांचं?’ या विचाराने क्षणभर अस्वस्थही झालो आणि तीच अस्वस्थता लपवण्यासाठी मी मोकळेपणानं हसलो. तसं कांही असण्याची शक्यता नाही हे माहित असूनही ती शक्यता गृहित धरूनच मी सहज हसण्यासारखी प्रतिक्रिया देणं आवश्यकच होतं. संवादाची सुरूवात अशी निसरड्या वाटेवरूनच झाली त्यामुळे पुढची पावलं मला हुशारीनेच टाकायला हवी होती.यांना मी इथं येण्यामागचं खरं कारण सांगणं योग्य नव्हतं हे खरं पण त्यासाठी खोटं बोलणंही मला योग्य वाटेना. आजोबा मी कांही बोलेन त्याची वाट पहात माझंच निरीक्षण करीत होते.

 “तसंच काहीतरी कारण आहे हे खरं आहे आजोबा, पण मला बँकेनं पाठवलेलं नाहीय. तुम्हाला आवर्जून भेटावं आणि या विषयावर तुमच्याशी बोलावं असं मलाच मनापासून वाटलं आणि मी तसं सांगितल्यावर डीजीएम्. साहेबांनी मला परवानगी दिली एवढंच.”

 ” कमालच आहे. मला आवर्जून भेटावं असं कां वाटलं तुम्हाला?”

 “या सर्व प्रकरणात ‘ह्युमन रिलेशन्स आस्पेक्ट’ कडं जाणीवपूर्वक नसेल पण थोडं दुर्लक्ष झालंय हे मला जाणवलं म्हणून तुमची भेट घ्यावी असं वाटलं.”

 “यासाठी त्या मॅनेजरशीच बोलायचंत ना?वाट वाकडी करून इथं कशाला यायचं?”

 ” मी त्यांच्याशीही बोललोय ना. त्यांनी त्यांची बाजू सांगितली, पण ती त्यांच्या दृष्टिकोनातून. हा प्रश्न योग्यरितीने सोडवण्यासाठी कुणावरही अन्याय होऊ नये याची काळजी मीच घ्यायला हवी ना?”

 “तो प्रभूदेसाई काय म्हणाला ते कळू दे तरी मला एकदा. माझ्या तक्रारखोर स्वभावावर ताशेरे ओढले असतील त्यानं. मी इतर कस्टमर्ससमोर त्याचा अपमान केला असंही तो म्हणाला असेल. स्वतःची कातडी बचावण्यासाठी तो यापेक्षा वेगळं करूच काय शकतोs..? ” संतापाने थरथरत ते ओरडले. त्यांचा आवाज ऐकून कानोसा घेत आत उभी असल्यासारखी त्यांची मुलगी धावत बाहेर आली.

 ” बाबाss, मी काय सांगितलं होतं तुम्हाला? जे बोलायचंय ते शांतपणे बोला. तेव्हासारखं आताही बीपी शूट झालं, तर त्रास बँकेला नाहीs तुम्हालाच होणाराय…” सात्विक संतापाने तिचा आवाज भरून आला.

 आजोबा वरमले.

 ” हो गं बाई, शांतपणे बोलतो. मग तर झालं? तू आत जा बरं. यांच्यासाठी चहा टाक.” ते म्हणाले. ती क्षणभर घुटमळली न् आत निघून गेली..

 “त्या दिवशी बी.पी. शूट झालं होतं?’त्या’ दिवशी म्हणजे कधी…?”

 “या तक्रारीमागचं रामायण घडलं त्या दिवशी. तुमच्या बँकेतच. त्या प्रभूदेसाईच्या केबिनमधे…” बोलतानाही त्या आठवणींनी आजोबांचा आवाज थरथरत होता. ” प्रभूदेसाई बोलला असेलच ना तुम्हाला त्याबद्दल?” त्यांनी कडवटपणे विचारलं.

 प्रभुदेसाई मला खूप कांही बोलले होते. ते सगळं त्यांच्याच शब्दांत यांना सांगणं मला शक्यच होणार नव्हतं. हे सहस्त्रबुध्दे एक रेल्वे पेन्शनर. प्रभूदेसाईंच्या ब्रॅंचमधे यांचा पेन्शन अकाऊंट होता. एक तारखेच्या पेन्शनसाठी होणाऱ्या गर्दीच्या वेळी, किंवा एरवीही इतर पेन्शनर्सच्या बाबतीतले कांही प्रश्न असले तरी हे केबिनमधे येऊन तावातवाने भांडायचे. बँकेत मॅनेजरशी किंवा स्टाफशी कसं बोलावं याचा त्यांना कांही विधिनिषेधच नसायचा. असं बरंच कांही

प्रभूदेसाई बोलले होते. सतत तक्रार करणारे कस्टमर्स सहसा बॅंकस्टाफच्या दृष्टीने अप्रिय असतात हे ओघानं आलंच. हे सगळं सांगून त्यादिवशी नेमकं काय झालं हे सांगताना प्रभूदेसाईना स्वतःच्या रागावर ताबा ठेवणंही मुश्किल झालं होतं.

 “हवं तर माझ्याआधी त्या ब्रँचला काम केलेल्या इतर मॅनेजरना विचारा. ते हेच सांगतील. आजपर्यंत मी इतक्या ब्रॅंचेसमधे मॅनेजर म्हणून काम केलंय, तिथं एकाही ठिकाणी माझ्याबद्दल तक्रार आहे कां ते बघा.” प्रभुदेसाई जीव तोडून सांगत होते…..

 ” त्यादिवशी मी सकाळी नुकताच केबिनमधे गेलो असताना आपले एक चांगले डिपॉझिटर सपत्नीक केबिनमधे आले. त्यांची प्रॉपर्टी विकल्यानंतर येणारी ह्यूज अमाऊंट आपल्या बँकेत डिपाॅझीट करण्याबाबत त्यांना माझा सल्ला हवा होता. आमचं बोलणं सुरू असतानाच हे महाशय माझ्या केबिनमधे घुसले. मी त्यांना पाच मिनिटं बाहेर बसायची विनंती केली. हातातलं काम संपलं की तुम्हाला बोलावतो असं सांगितलं. त्यांना तो त्यांचा अपमान वाटला. डोकं फिरल्यासारखं ते चिडून मला अद्वातद्वा बोलू लागले. त्यांची समजूत घालून त्यांना शांत करायचे सगळे प्रयत्न व्यर्थ ठरले तेव्हा आमचे अकौंटंट पुढे झाले. यांना केबिनमधून बाहेर घेऊन गेले, स्वत: त्यांचं काम करून दिलं. मी त्यांच्याविरूध्द तक्रार करेन या भितीपोटी माझ्याविरुद्धच खोटी तक्रार करून स्वतः साळसूद असल्याचा आव आणतायत ते.” प्रभूदेसाई म्हणाले होते.

 बँक म्हटलं की अशी वेगवेगळ्या स्वभावाची असंख्य माणसं ग्राहकरूपांत संपर्कात येणं ही तशी माझ्यासाठी इतकी वर्षं नित्याचीच बाब होती. हे असं चिघळलेलं प्रकरण मात्र मी प्रथमच अनुभवत होतो.

 प्रभूदेसाईंनी सांगितलेलं हे असंच सगळं मनात भिरभिरत असताना आजोबांच्या शब्दांनी मी भानावर आलो.

 “त्यादिवशी नेमकं काय घडलं ते तो प्रभूदेसाई बोलला असेलच ना तुम्हाला..?” आजोबांनी पुन्हा विचारलं.

 त्यांना काय उत्तर द्यावं तेच मला कळेना.

 “हो, सांगितल़य ना…” मी कसेबसे शब्द जुळवू लागलो. ” पण त्यांनी जे सांगितलंय ते त्यांच्या स्वतःच्या वागण्याचं समर्थनही असू शकतं ना? रूजवात न करता मला ते खरं मानून नाही ना चालणार?” मी म्हणालो. ते समाधानाने हसले. सहस्त्रबुद्धे आजोबांना असं प्रसन्न हसताना मी प्रथमच पहात होतो. त्यांच्या चेहऱ्यावरचं ते स्मित क्षणभरच टिकलं. दुसऱ्याच क्षणी ते विरून गेलं. तो प्रसंग पुन्हा जगत असल्यासारखे ते एकटक समोर पहात राहिले. पहाता पहाता त्यांचा चेहरा विदीर्ण झाला. मनाला झालेल्या खोलवर जखमेला नकळत धक्का लागल्यासारखी ती जखम भळभळून वहात राहिली ….!

क्रमश:…  (प्रत्येक गुरूवारी)

©️ अरविंद लिमये

सांगली (९८२३७३८२८८)

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ परतीचा फराळ!… लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – सौ. स्मिता सुहास पंडित ☆

सौ. स्मिता सुहास पंडित

? विविधा ?

☆ परतीचा फराळ!… लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – सौ. स्मिता सुहास पंडित ☆

परतीचा पाऊस असतो तसा परतीचा फराळही असतो. आठवणी देऊन जाणारा आणि जाताजाता हुरहूर लावणारा…!

घराघरात कुशल गृहीणी आता डब्यांची अदलाबदल करुन संपुर्ण घराला कन्फ्युज करायला सुरुवात करतात. मोठ्या डब्यांमधला फराळ लहान डब्यात शिफ्ट होतो. निवडणुका संपल्यावर नेतेमंडळी दिसत नाहीत, तसा कालपर्यंत समोर असलेला फराळ आता शोधावा लागतो.

ओल्या नारळाच्या करंज्या एखाद्या सौंदर्यसाम्राज्ञीने आलिशान कारमधे बसून नीट दर्शनही न देता वेगानं निघून जावं तशा केल्या आणि संपल्या सुध्दा अशा गायब होतात.

चकलीच्या डब्यावर सगळयांचाच डोळा असतो. पण शेवटची चकली खाताना होणारा आनंद प्रचंड असतो. ती खाल्ल्यावर डबा घासायला न टाकता झाकण लावून तो तसाच ठेवणा-याला फसवणे आणि अपेक्षाभंग करणे या गुन्ह्याची शिक्षा मिळायला हवी असं माझं मत आहे.

पाहुण्यांसाठी मागच्या रांगेत लाडवाचा डबा लपवला जातो. कारण लहानपणापासून दिवाळी झाल्यानंतर महत्वाचे फराळाचे पदार्थ संपल्याचे कळताच येणारे पाहुणे हा एक खास वर्ग आहे हे पटलंय.

प्रत्येक फराळाच्या पदार्थाची एक एक्सपायरी डेट असते. ती गृहीणींना अचूक माहीती असते. इतके दिवस विचारावे लागणारे चकलीच्या डब्यासारखे मौल्यवान डबे सहज उपलब्ध होत समोर दिसू लागले की भोळीभाबडी जनता उगाच आनंदून जाते. पण त्यामागे एक्सपायरी डेटचं राजकारण असतं.

डब्यात तळाला गेलेल्या शंकरपाळयांचा डबा चहा केल्यावर मुद्दाम समोर ठेवला जातो. कारण त्याचीही एक्सपायरी डेट जवळ येत असते.

जास्त मीठ मसाला तळाशी असलेला दाणे संपत चाललेला चिवडा कांदा- टाॅमेटो -कोथिंबीरीचा मेकअप करुन समोर येतो. मिसळीचा बेत आखला जातो.

शेव हा प्रकार कधी संपवावा लागत नाही. तो संपतो, पोहे उपमा करुन त्यावर सजावटीसाठी वापरली जात ती संपते.

असा हा ‘परतीचा फराळ’ दिवाळीच्या आठवणींचा… रिकाम्या कुपीतल्या अत्तराच्या सुगंधासारखा… जिभेवर रेंगाळणा-या चवीचा… जाताजाता पुढच्या वर्षी पुन्हा एकत्र धमाल करु म्हणत एकमेकांचा निरोप घेत डब्यातून बाहेर पडणारा… गृहिणीला केल्याचं समाधान- कौतुक देणारा… आणि शेवटी शेवटी संपत जाताना आणखी चविष्ट होत जाणारा…

तर मग एन्जॉय तुमचा परतीचा फराळ!

लेखक : अज्ञात 

प्रस्तुती : सौ. स्मिता सुहास पंडित

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ प्रकाश ते प्रज्ञा – लेखक : श्री संतोष गजानन खाडये ☆ प्रस्तुती – सौ. गौरी गाडेकर ☆

सौ. गौरी गाडेकर

?  विविधा ?

☆ प्रकाश ते प्रज्ञा – लेखक : श्री संतोष गजानन खाडये ☆ प्रस्तुती – सौ. गौरी गाडेकर ☆

दिवाळीची धावपळ, घराघरातील जल्लोष आणि रात्र उजळवणारे अनंत दिवे थांबले की आयुष्य एका गूढ शांततेत शिरतं. फुलबाजे, आकाश उजळवणारे कंदील, फटाके, विविध आवाज करणारे फटाके यांच्या किरर्र आवाजानंतर आकाशात उरलेली ती धुरकट झाक जणू मनावरही पसरते, पण त्या धुक्याच्या पलीकडे एक नवा प्रकाश उमलत असतो. तो दिव्यांचा नाही, आत्म्याचा असतो. घरभर उरलेले दिवे मंदावलेले असतात, पण त्यांचा उजेड अजूनही भिंतींवर पसरलेला असतो, आणि कदाचित मनातही. त्या प्रकाशात माणूस स्वतःकडे नव्या नजरेने पाहू लागतो. सणाच्या गडबडीत विसरलेली आत्मशांती पुन्हा जागी होते. गोडधोडाचे डबे रिकामे झालेले असतात, पण हृदय गोड झालेलं असतं, कारण सणानंतरही राहते ती एकच भावना : कृतज्ञतेची.

दिवाळी ही केवळ प्रकाशाचा सण नाही; ती प्रज्ञेचा आरंभ आहे. जेव्हा आपण घर झाडून, रंगवून, सजवतो, तेव्हा नकळत आपलं अंतःकरणही त्या उजेडासाठी तयार होतं. त्या तयारीत प्रेम, सहकार्य, क्षमा आणि आशेचे नवे रंग मिसळलेले असतात. सण संपल्यावर अचानक मनात एक प्रश्न जागा होतो — “या उजेडाचं पुढे काय करायचं? ” आणि इथूनच सुरू होतो प्रकाश ते प्रज्ञेचा प्रवास.

प्रकाशाचं खरं सार हे पाहण्यात नाही, तर जाणण्यात आहे. बाहेरच्या दिव्यांनी अंधार हटतो, पण आतल्या अंधारावर फक्त प्रज्ञेचा प्रकाश चालतो. ती प्रज्ञा म्हणजे विवेक — काय टिकवायचं, काय सोडायचं, कोणावर प्रेम करायचं, आणि कोणत्या मार्गाने पुढे जायचं, हे समजणं. गावातल्या शेतकऱ्याला जेव्हा दिवाळीनंतर पुन्हा मातीचा वास जाणवतो, तेव्हा तो जाणतो की हा हंगाम फक्त पिकांचा नाही — तो मनाचाही आहे. माती जशी जुन्या तणांपासून मुक्त होऊन नव्या पेरणीसाठी सज्ज होते, तसंच माणसाचं मनही जुन्या विचारांचं ओझं झटकून नव्या विचाराचे स्वागत करते. हीच दिवाळीनंतरची नवचेतना — अंतर्मनातील नव्या अंकुरांची सुरुवात.

शहरात ही नवचेतना वेगळ्या रूपात प्रकटते. गगनचुंबी इमारतींच्या खिडक्यांतून येणारा दिवाळीनंतरचा सकाळचा प्रकाश शांत असतो, पण अर्थपूर्ण. रात्रीच्या फटाक्यांच्या तेजानंतर आता तो प्रकाश स्थिर आहे, जणू सांगतो, “आता बाहेरचं पुरे, आता आत डोकाव. ” त्या क्षणी माणूस थोडा थांबतो — ऑफिसला निघताना आरशात स्वतःकडे पाहतो आणि मनात विचारतो, “मी खरंच समाधानी आहे का? ” हीच आत्मप्रज्ञेची पहिली ठिणगी असते.

दिवाळीच्या दिव्यांचा प्रकाश जर बाहेर उजळत असेल, तर त्यातून प्रज्ञा जन्म घेते — जी विचार उजळवते. प्रज्ञा म्हणजे केवळ ज्ञान नाही, तर समज. ती सांगते — संपत्तीपेक्षा समाधान मोठं आहे, प्रसिद्धीपेक्षा प्रेम अधिक मूल्यवान आहे, आणि अंधाराला शाप देण्यापेक्षा एक दिवा पेटवणं अधिक अर्थपूर्ण आहे. जगातील मानवजातीच्या विभिन्न विचारांचे स्वागत, डावे उजवे सारेच विचार मानवीय प्रगतीचे द्योतक आहेत तेव्हा कुणाचा द्वेष नको तर सर्वांनीच एक दुसऱ्याच्या विचाराचा अस्तित्वाचा दिवा एकमेकात उजळायला हवा. प्रज्ञेचा मार्ग म्हणजे अंतर्मनातील प्रकाशाकडे प्रवास. त्या प्रवासात ना गडबड असते, ना गर्दी — फक्त स्वतःशी संवाद असतो. “माझं आयुष्य फक्त उपभोगासाठी आहे का, की काहीतरी निर्माण करण्यासाठी? ” या प्रश्नाचं उत्तरच माणसाला नव्या चेतनेत नेऊन ठेवतं.

दिवाळीनंतरची नवचेतना म्हणजे बदलाची भीती नाही, तर बदलाची ओढ. ती सांगते — जसा दिवस रात्र ओलांडून उजाडतो, तसंच मनाचंही पुनर्जन्म घेणं आवश्यक आहे. अंधाराशिवाय प्रकाशाची किंमत नाही, आणि संघर्षाशिवाय प्रज्ञा जागृत होत नाही. खरी संपत्ती तीच, जी अनुभवातून मिळते. खरं यश तेच, जे मनाला स्थैर्य देतं. आणि खरी दिवाळी तीच, जी प्रत्येक दिवशी आपण मनात साजरी करतो.

आज दिवाळी संपलेली नाही, तर आरंभ आहे नव्या विचारांचा, नव्या दृष्टिकोनाचा, आणि नव्या जीवनदृष्टीचा. आपण बाहेरचे दिवे विझवले असले, तरी मनातला दिवा जपला, तर संपूर्ण वर्ष प्रकाशमान होईल. जर मन मोठं असेल, तर घरातील प्रत्येक कोपरा मंदिर बनतो. आणि तोच क्षण असतो, जेव्हा प्रकाश प्रज्ञेत रूपांतरित होतो.

दिवाळीच्या सणानंतर दिवाळी बाहेर नव्हे, आत उजळते.

लेखक – श्री संतोष गजानन खाडये 

प्रस्तुती – सौ. गौरी सुभाष गाडेकर

संपर्क –  1/602, कैरव, जी. ई. लिंक्स, राम मंदिर रोड, गोरेगाव (पश्चिम), मुंबई 400104.

फोन नं. 9820206306

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares