मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ आध्यात्मिकतेचा श्रेष्ठ अनुभव – पंढरीची पायी आषाढी वारी 2023 – भाग –1 ☆ श्री सदानंद आंबेकर ☆

श्री सदानंद आंबेकर

? मनमंजुषेतून ?

☆ आध्यात्मिकतेचा श्रेष्ठ अनुभव – पंढरीची पायी आषाढी वारी 2023 – भाग –1 ☆ श्री सदानंद आंबेकर

भारत – अध्यात्माची मायभूमी – जिथे सजीव आणि निर्जीव दोन्हींमधे देव बघितला जातो। श्रध्दा हा जीवनाचा आधार – त्या पार्श्वभूमीवर अनेक देवस्थानं आणि त्यांच्या विविध परंपरा। अशीच एक सुमारे ७०० वर्षांपासून चालत आलेली उच्चस्तरीय परंपरा आहे —’आषाढ आणि कार्तिक महिन्यात होणारी पंढरीची वारी।’

विठ्ठल-रखुमाईचा जागृत वास असलेली पुण्यनगरी पंढरपूर… येथे फक्त महाराष्ट्रच नाही तर इतर प्रांतातून आणि परदेशातूनसुध्दा भाविकगण वारी करायला मुख्यतः आषाढ महिन्यात येतात। ईश्वर कृपेने ही पायी वारी करण्याची संधी यंदा मला मिळाली।

सुरुवातीला या यात्रेबद्दल काहीच माहित नसल्यामुळे मनात अनेक प्रश्न काहूर माजले होते। बरेच प्रश्न – कुठं जाऊ, किती अंतर असणार, रस्ता कसा असेल, लोकं कोण नि कसे असतील, जेवणाचं, थांबायचं कसं नि कुठे, इत्यादि होते. पण यांची माहिती मिळवली नि माझ्या गृहनगर भोपाळ येथून देवाचं नाव घेऊन घराबाहेर पाऊल  टाकलं।

पुण्यात माझी आतेबहिण नि भाची यांची भेट आमच्या दिंडीने ठरविलेल्या ठिकाणी – ‘गुप्ते मंगल कार्यालय, शनिवार पेठ पुणे‘ येथे झाली। खरं तर माझी यात्रा ताईंच्यामुळे शक्य झाली कारण त्यांनी कार्यक्रमाची महिती मला दिली नि मी त्यांच्यासोबत यात्रेची तयारी केली।

आमची यात्रा ‘संत विचार प्रबोधिनी’ या दिंडीसोबत होणार होती। त्याच्या संचालिका हभप सौ माईसाहेब गटणे यांनी कार्यक्रमाची संपूर्ण माहिती आधीच सर्वांना व्हाटस्एपच्या माध्यमातून दिली होती। त्या सूचनापत्रकाप्रमाणे पायी वारीसोहळा हा ११ जून ते ३० जून २०२३ पर्यंत चालणार होता।

११ जून :: पहिले पाऊल

गुप्ते मंगल कार्यालयात आमचे आवश्यक सामान, जे पुढे यात्रेत लागणार होते ते ठेवून, एका लहान बॅगमधे रस्त्यात लागणारे लहान-सहान सामान घेऊन आम्ही श्रीक्षेत्र आळंदीला निघालो। अद्याप आपल्या सह-वारकरी मंडळीशी आपसांत ओळखी झाल्या नव्हत्या।

माझी आळंदीला ही दुसरी यात्रा होती, पण या वेळेस उद्देश् वेगळा होता, त्यामुळे मनात एक वेगळा उत्साह आणि उत्सुकता होती। पुणे नगरात चहूकडे वारकरी दिसत होते. त्यात शहरापेक्षा गावची मंडळी जास्त आहेत असे वाटले, पण नंतर हे दृश्य बदललं। पायी चालत तिथे ठरलेल्या ठिकाणी- विठ्ठल कृपा मंगल कार्यालयात आम्ही सुमारे चार वाजता पोहोचलो। त्याच वास्तूत अजून एक दिंडी आली असल्यामुळे थोडा गोंधळ झाला, पण लगेच आपले ठिकाण पहिल्या माळयावर आहे हे कळले।

त्या रात्री तिथेच मुक्काम असल्यामुळे बऱ्याच लोकांनी आपली जागा ठरवून सामान लावून घेतले होते। येथे जुने वारकरी पूर्वओळख असल्याने एकत्र आले नि नवे पण हळूहळू त्यांच्यात मिसळू लागले। आमची एकूण संख्या १५० आहे हे कळविण्यात आले।

उन्हाळा खूप असल्याने पाण्याची गरज खूप जास्त भासत होती. तेव्हा वारंवार बाहेर जाऊन पाणी आणावे लागत होते। थोडयाच वेळात दिंडीच्या संचालिका सौ माईसाहेब आल्या नि मंचावर त्यांनी स्थान ग्रहण केले। सुरुवातीला वारीच्या फीचा हिशेब, पावती देणे ही किरकोळ कामं आटोपून नंतर संपूर्ण यात्रेची माहिती आणि वारीचे अनुशासन सांगितले। या मधेच सर्वांना या दिंडीचा १९८६ पासूनचा पूर्व इतिहास नि पूर्व वारीप्रमुख वै.ह.भ.प.डॉ रामचंद्र देखणे यांचा जीवन परिचय देण्यात आला। हे पूर्ण झाल्यावर त्यांची प्रवचन सेवा झाली जी सर्वांनी मनापासून ऐकली।

आजच्या दिवशी म्हणजे ११ जूनला संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी आळंदीहून संध्याकाळी निघणार होती अन् त्या दिवशी परंपरेप्रमाणे तिचा मुकाम तिथेच असल्यामुळे दिंडीच्या व्यवस्थे- -प्रमाणे पुण्यात स्वतःची सोय असणारे वारकरी पुण्याला परत जाऊ शकत होते। रात्री सुमारे आठ वाजता वाजत-गाजत भक्तजनांच्या गजरासोबत पालखीची यात्रा सुरू झाली। गर्दी खूप जास्त असल्याने मला दर्शन काही होऊ शकले नाही। पोलिसांना गर्दी सांभाळायला खूप मेहनत करावी लागत होती। नंतर रात्री नगर बस सेवेत बसून पुण्याला परत आलो।

१२ जून :: माऊली आलेत पुण्याला .. 

दुसरे दिवशी १२ जूनला पालखीचे पुण्यात आगमन झाले अन् तिथे पालखीचा एक दिवस मुक्काम होता. त्यामुळे दिंडी पण १३ जूनला पुण्याला गुप्ते मंगल कार्यालयात थांबली। पुण्यातील स्थानीय वारकरी यांना आज इथे हजर होण्याबद्दल सूचना होती।

१४ जून :: वारी निघाली पंढरपुराला : पुणे – सासवड अंतर ३८.३४ कि.मी. 

शेवटी १४ जूनला तो सूर्यादय झाला ज्याची सर्वांना प्रतीक्षा होती। सकाळी पाच वाजल्या- -पासून सर्व वारकरी पूर्ण उत्साहात तयार झाले। तेव्हाच सूचना झाली की सर्वांनी आपले सामान लगेजच्या ट्रकवर ठेवावे। पहिला दिवस असल्यामुळे थोडी घाई गर्दी होत होती पण अखेरीस सर्वांचे सामान चढले। इथे सांगण्यात आले की जवळच एका ठिकाणी सर्वांचा चहा इत्यादि होईल नि मग पुढे वाटचाल होईल। त्या प्रमाण तिथे चहा-नाश्ता नि दिवसाकरिता खाण्याचे पैकेट वाटप सुरू झाले। चहा-कॉफी, नाश्ता घेऊन आता पाठीवर आवश्यक तेवढे सामान, मनांत प्रचंड उत्साह, उत्सुकता घेऊन आणि मुखाने जय हरि विठ्ठल घोष करीत सर्व ओळीत लागले नि ‘ ज्ञानोबा-तुकाराम माउली ‘ असा नाद करीत आमची ‘ संत विचार प्रबोधिनी ‘ची दिंडी वारीच्या मार्गाला निघाली। येथेच ज्ञानेश्वर महाराज आणि तुकाराम महारांजाच्या पालख्या एकत्र येतात नि नंतर वेगळया मार्गावर चालू लागतात।

– क्रमशः भाग पहिला…

© सदानंद आंबेकर

भोपाळ, मध्यप्रदेश 

मोब. 8755756163 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ ‘ग्रीन टाय…’ – भाग – २ ☆ श्री सुनील काळे ☆

श्री सुनील काळे

? मनमंजुषेतून ?

☆ ‘ग्रीन टाय…’ – भाग – २ ☆ श्री सुनील काळे 

(आयझॅक खूप गमतीशीर पण विनोदी माणूस होता)…   इथून पुढे. 

मी सुसाईड करणार असल्याचे सांगितल्यावर त्याने माझे प्रथम खूप मनापासून अभिनंदन केले… आणि मला म्हणाला, “ इतक्या प्रचंड संघर्षाने चित्रकलेचे प्रशिक्षण घेतलेस, पाचगणी परिसरातील असंख्य चित्रे रेखाटलीस, चित्रप्रदर्शने केलीस, पण जागेअभावी तुला खूप त्रास झाला त्याचा मी साक्षीदार आहे. चित्रे पावसात भिजली, तुझे खूप नुकसान झाले याचीही मला जाणीव आहे. तुझ्या सर्व प्रश्नांची उत्तरे माझ्याकडे नाहीत, तुला यश का मिळाले नाही ? हे मी सांगू शकत नाही. तू खूप कष्ट घेतले आहेस त्यामुळे तू आत्महत्या करू नकोस असेही मी तुला सांगणार नाही. पण मी एक तुला विनंती करतो की तुझी जी कला हातामध्ये जिवंत आहे ही तुझ्याबरोबरच संपणार… 

…. तर काही दिवस तू बिलिमोरिया स्कूलमध्ये मुलांना चित्रकला शिकव, तेथे कोणीही कलाशिक्षक नाही.  त्या मुलांना एलिमेंटरी व इंटरमिजिएट या चित्रकला विषयाच्या परीक्षा द्यायच्या आहेत, आणि त्यांना गुरुची (कलाशिक्षकाची ) फार आवश्यकता आहे.  जर तू सुसाईड करून मरून गेलास तर तुझी कलाही तुझ्याबरोबर मरणार… जर तू ही कला कोणाला शिकवली नाहीस तर या चर्चमधला येशु तुला कधीही माफ करणार नाही … फक्त एक महिना तू या मुलांना शिकव व नंतर निवांतपणे आत्महत्या कर. तुला मी अडवणार नाही …. “ 

“पण मी चित्रकला कधी शिकवली नाही, ही शाळा इंग्रजी माध्यमाची आहे.  माझे अे. टी. डी किंवा ए .एम झालेले नाही. ते शाळेतील लोक मला कसे स्वीकारतील ? हे मला जमणार नाही …. मी कमर्शियल आर्ट शिकलेलो आहे..  शिक्षण क्षेत्राशी माझा कधी संबंध आला नाही,”  अशी विनंती मी त्याला केली.

आयझॅक जिद्दी होता. त्याने त्याच्या गळ्यातील ग्रीन रंगाची टाय काढली आणि माझ्या गळ्यात घातली. आणि म्हणाला, “ मिस्टर आर्टीस्ट सुनील काळे.. नाऊ यु आर लुकिंग व्हेरी स्मार्ट आर्टटीचर… तुला मी वचन देतो की तुला कसलाही त्रास होणार नाही, कसलाही इंटरव्यू घेतला जाणार नाही, कसल्याही अटी टाकल्या जाणार नाहीत.  सकाळचा नाष्टा , दोन्ही वेळचे जेवण, संध्याकाळचा चहा आणि राहण्यासाठी तुला एक  खोली मिळेल. माणसाला जगायला आणखी काय लागते ? अन्न ,वस्त्र निवारा व जॉब …

तुला जर या सगळ्या गोष्टी मिळत असतील तर हे चॅलेंज तू का स्वीकारू नये ? एक महिन्याचा तर फक्त प्रश्न आहे . शिवाय तू जी आत्महत्या करणार आहेस त्याला मी विरोधही करत नाही. मग प्रश्न येतो कुठे ? या जगातून जाण्यापूर्वी अनुभवलेले, शिकलेले सर्वोत्तम ज्ञान तू त्या मुलांना दे एवढीच माझी मागणी आहे .” 

थोडा शांतपणे विचार केल्यानंतर मलाही त्याचे म्हणणे पटले. आपले सर्वोत्तम ज्ञान मुलांना द्यायचे मगच मरायचे…असे मी ठरवले.

दुसऱ्या दिवशी बिलिमोरिया स्कूलमध्ये सकाळी हजर झालो .

प्राचार्य सायमन सरांनी मला अपॉइंटमेंट लेटर दिले आणि एका छोट्या मुलांच्या वर्गात शिकवण्यासाठी पाठवले. वर्गात प्रवेश केल्यानंतर मला पाहून ती छोटी मुले फार आनंदित झाली. त्यांना खूप वर्षांनी आर्ट टीचर मिळाल्यामुळे उत्साह आला होता. ती सगळी मुले आणि मुली माझ्याभोवती जमा झाली. त्यांची स्वतःची चित्रे, चित्रकलेच्या वह्या, क्रेयॉन कलरचे बॉक्स दाखवू लागली. मुलांचा उत्साह पाहून मीही खुष झालो आणि त्यांना चित्रकला शिकवू लागलो, जणू मी माझ्या स्वतःच्या छोट्या मुलीला शिकवत आहे असा भास मला होत होता…

शिकवता शिकवता दोन तास कसे संपले हे मलाही कळले नाही. सायली पिसाळ, आकाश दुबे, उत्सव पटेल, ताहीर अली, अशी अनेक  नावे आजही मला आठवत आहेत. नंतर दुसरा वर्ग ,नवीन तास, नव्या ओळखी, नवी उत्सुकता असलेली मुले, त्यांच्या निरागस भावना मला हेलावून गेल्या. नव्याने ओळखीची होत असलेली छोटी मुले व मुली शाळा सुटल्यानंतरही माझ्या खोलीभोवती घिरट्या घालत राहिली त्यांना त्यांची नवीन चित्रे दाखवायचा खूप उत्साह असायचा. मग मीही त्यांना क्राफ्ट, अरोगामी. चित्रांचे वेगवेगळे विषय उत्साहाने शिकवू लागलो. मीही नियमित त्यांची व्यक्तिचित्रे, स्केचिंग करु लागलो. शशी सारस्वत, संजय अपार सर, दुबे मॅडम, छाया व संजय उपाध्याय, मोहीते सर, नॅथलीन मिस, सुनील जोशी सर, असे नवीन मित्रही या बिलिमोरिया शाळेत भेटले. अशा रीतीने एक महिना, दुसरा महिना, तिसरा महिना कसा संपला हे कळलेच नाही…

शाळेचे एक नवे वेगळे विश्व मी अनुभवत होतो …

हे माझ्यासाठी फार वेगळे जगणे होते. शाळेत मी जरी रोज नवीन शर्ट घालत असलो तरी माझी टाय मात्र एकच होती… 

…. आयझॅकने दिलेली ग्रीन टाय. 

अशा रीतीने एक वर्ष संपले आणि मी सेंट पीटर्स या ब्रिटिश स्कूलमध्ये गेलो आणि माझी पत्नी स्वाती बिलिमोरिया स्कूलमध्ये जॉईंट झाली.

सेंट पीटर्स मध्ये चित्रकला विषयाला खूप प्रोत्साहन मिळत होते. मुलं देखील नवनवीन गोष्टी शिकत होती त्याचबरोबर माझी चित्रकला ही नव्याने बहरून येत होती. या नव्या शाळेच्या परिसरातील अनेक निसर्ग चित्रे मी नव्याने रेखाटू लागलो. त्या काळात माझे चित्रकलेचे प्रदर्शन नेहरू सेंटर, नंतर ओबेराय टॉवर हॉटेल व 2002 मध्ये जहांगीर आर्ट गॅलरी येथे झाले. याठिकाणी अतिशय उत्तम प्रतिसाद मिळाला .

माझी आर्थिक स्थितीही सुधारली 2003 साली मी नवीन रो हाऊस घेतले. नवा स्टुडिओ बांधला .

सेंट पीटर्स येथे ड्रेस कोड असल्यामुळे भरपूर कपडे घेतले. त्यावेळी माझ्याकडे रंगीबेरंगी ८० टाय झाल्या होत्या. आजही त्या आठवण म्हणून माझ्याकडे आहेत . पण एक टाय मात्र मी प्रेमाने जिव्हाळ्याने कायमची जपून ठेवलेली आहे ….. 

…. ती म्हणजे आयझॅक सरांची ग्रीन टाय. 

मी कधीही दुःखी आणि निराशेच्या गर्तेमध्ये असलो की मला आयझॅकची आठवण येते. आता आयझॅक अमेरिकेत असतो. त्याने आता लग्नही केलेले आहे .फेसबुकवर अधून मधून भेटत असतो. मी कितीही श्रीमंत झालो, माझी परिस्थिती सुधारली ,बिघडली तरी एक गोष्ट मी त्याला कधीही परत करणार नाही ती म्हणजे ग्रीन  टाय …. कारण ती टाय मला स्वतःला कधीकधी आयझॅक बनवते. माझ्याकडे कितीतरी कलाकार मित्र येत असतात . काही नवीन शिकणारी असतात, काही निराश झालेले असतात , काही उमेद हरवलेले कलाशिक्षक असतात, अनेक गोष्टींच्या तक्रारी करत असतात, त्यांना मार्ग सापडत नसतो …  अशावेळी मी काळे सरांच्या ऐवजी आयझॅक होतो ..  नव्हे आयझॅक सर संचारतो माझ्यात…

ज्या ज्या वेळी अशी निराशेने ग्रासलेली , व्यथित, दुःखी माणसे मला भेटतात त्यावेळी आपण प्रत्येकाने आयझॅक झाले पाहीजे असे माझे आंतरमन मला नेहमी सांगत असते, कारण त्याची ग्रीन टाय सतत मला आठवण करून देते.

जीवन हे आत्महत्या करून संपवण्यासाठी नसते तर आपल्यातील सर्वोत्तम देण्यासाठी, सर्वोत्तम जगण्यासाठी ,सर्वोत्तम शिकण्यासाठी, सर्वोत्तम पाहण्यासाठी, सर्वोत्तम शिकवण्यासाठी , सर्वोत्तम ऐकण्यासाठी असते.

….. असे अनेक आयझॅक मला वेळोवेळी भेटत गेले. आणि माझे आयुष्य समृद्ध करत गेले. एकवीस वर्ष झाली आता या घटनेला, आत्महत्या करायचे तर मी कधीच विसरून गेलो आहे. असे अनेक आयझॅक आपल्याला वेगवेगळ्या नावाने, वेगवेगळ्या रुपात भेटत असतात. कधी भेटले नसले तर तुम्हालाही असा आयझॅक भेटावा व एक ग्रीन टाय मिळावी किंवा…

…. तुम्हीच कोणाचे तरी आयझॅक व्हावे आणि त्या निराश माणसाला एक ग्रीन टायसारखी वस्तू द्यावी म्हणजे निराशेचा अंधार कायमचा दूर व्हावा….

म्हणून खूप खूप शुभेच्छा !

तर अशी आहे माझी ‘ग्रीन टाय’ ची आठवण…..  मला सतत प्रेरणा देणारी……..

– समाप्त – 

© श्री सुनील काळे

संपर्क – 32, निसर्ग बंगला, मेणवली रोड, स्वप्नपूर्ती मंगल कार्यालयाजवळ, मु .पो. भोगाव, ता. वाई, जि.सातारा – ४१२८०३. 

मोब. 9423966486, 9518527566

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ ‘ग्रीन टाय…’ – भाग – १ ☆ श्री सुनील काळे ☆

श्री सुनील काळे

स्वपरिचय 

जन्मगाव पाचगणी असल्याने निसर्गाच्या सान्निध्यात राहून वाई पाचगणी महाबळेश्वर या परिसरातील निसर्गरम्य जागेवर जावून अनेक जलरंगातील चित्रे रेखाटनाचा नाद लहानपणापासून आहे. या परिसरातील पाच हजारांपेक्षा जास्त चित्रे रेखाटलेली आहेत. त्यांचे प्रदर्शन मुंबईच्या सुप्रसिद्ध जहाँगीर आर्ट गॅलरी, नेहरू सेंटर मुंबई, ऑबेरॉय टॉवर्स, म्युझियम आर्ट गॅलरी येथे व पुण्यात बालगंधर्व येथे प्रदर्शने केलेली आहेत. अनेक प्रसिद्ध कलारसिक लोकांनी चित्रे विकत घेतलेली आहेत. लेखन, वाचन, चित्रकला, बागकाम, कॅलिग्राफी, फिरणे, रेखाटने करणे, गाणी ऐकणे, निसर्गात रममान होणे व शांत राहणे हे आवडीचे छंद आहेत.

? मनमंजुषेतून ?

☆ ‘ग्रीन टाय…’ – भाग – १ ☆ श्री सुनील काळे 

आयुष्य मोठे गमतीशीर असते, किती तरी अकल्पित, नावीन्यपूर्ण, रोमांचक , सुखाच्या, दुःखाच्या घटना आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यात रोज घडत असतात… आणि विशेष म्हणजे प्रत्येकाचे रोजचे जगणेही वेगवेगळे असते… एकासारखे दुसऱ्याचे जगणे साचेबंद नसते.

अशा या आयुष्यात कधीकधी वाईट प्रसंगाची मालिकाच सुरु होते, आणि चांगला कणखर दिसणारा माणूसही निराशेच्या गर्तेत खोलवर रुतत जातो . काही माणसं चेहऱ्यावर हुशारीचा आव आणत असतात पण मनातून मात्र कोलमडून एखाद्या वटवृक्षाप्रमाणे उन्मळून पडलेली असतात… असा प्रसंग प्रत्येकाच्या आयुष्यात एकदा तरी येतोच की खूप झाले जगून, आता नको जगायला यापुढे…. माणसं कबूल करत नाहीत पण आतून त्यांना या प्रसंगाची आठवण- धगधग मनात साठलेली असते .

1995 साली मी मुंबईत जहांगीर आर्ट गॅलरीमध्ये चित्रप्रदर्शन केले होते आणि ते सर्व प्रकारे विशेषतः व्यावसायिक स्तरावर यशस्वी झाले . त्या काळात मी नालासोपारा येथे राहायचो. माझी नोकरी केमोल्ड कंपनीच्या फ्रेमिंग डिपार्टमेंटमध्ये असल्याने कंपनीच्या लोअर परेल, प्रिन्सेस स्ट्रीट, वसई आणि जहांगीर आर्ट गॅलरी येथे मला रोज जायला लागायचे .सकाळी सात ते रात्री अकरा वाजेपर्यंत मी थकून भागून घरी परत यायचो. माझं हे रोजचं रुटीन झालं होते. त्या रुटीनला आणि त्या भयानक गर्दीच्या रेल्वे प्रवासाला मी मनापासून कंटाळलो होतो. रोज जगण्याऐवजी मी रोज मरत चाललोय ही भावना खूप खोल ठसली होती माझ्या मनात….

मला वाई, पाचगणी , महाबळेश्वरचा निसर्ग खूप आवडायचा म्हणून मी परत कायम मूळ गावी जाण्याचा निर्णय घेतला. पाचगणीमध्ये मला चित्र विक्रीसाठी आर्ट गॅलरी तयार करायची होती.  या आर्ट गॅलरीच्या ध्येयासाठी मी बेफाम झालो होतो, मी मनापासून प्रयत्न करत होतो. शेवटी सिडने पॉईंटच्याजवळ मला एक जुना बंगला भाड्याने मिळाला.  त्या जुनाट बंगल्याला आर्ट गॅलरीचे स्वरूप देताना माझे सर्व पैसे कसे संपले हे मलाही कळले नाही.  तरीही जिद्दीने आम्ही आर्ट गॅलरी सुरू केली.  अतिशय उत्तम प्रतिसाद सर्व पर्यटकांकडून व स्थानिकांकडून आम्हाला मिळत होता. परंतु एका वर्षाच्या आत घरमालकाने फसवले आणि त्याची जागा परत मागितली.  मी त्याला अनेक विनंत्या करूनही त्याने नकार दिला. त्यामुळे खऱ्या अर्थाने व्यावसायिकरित्या मी पूर्णपणे कोलमडून पडलो. त्यानंतर उतरती कळा लागली …

मग नव्या जागांसाठी शोध सुरू राहिला.  पुढे पाचगणी क्लब, टेबल लँडवरची गुहा, मॅप्रो गार्डन अशा वेगवेगळ्या ठिकाणी प्रयत्न करत राहिलो . प्रत्येक ठिकाणी नवीन अडचण, नवा प्रयोग, नवे इंटेरियर करावे लागायचे. प्रत्येक वर्षी जागा बदलावी लागायची. त्याकाळात मॅप्रो गार्डन येथे उघड्यावर प्लाझा सारखे प्रदर्शन लावले होते. मे महिन्यात एक दिवस अचानक वळवाचा पाऊस वादळासारखा कोसळला आणि सर्व चित्रे, ग्रीटिंग कार्डस, कॅलेंडर, पोस्टर्स, सर्व काही धो धो पावसात भिजून गेले. मॅप्रोचे कोणीही कामगार मदतीस आले नाहीत, त्यामुळे प्रत्यक्ष जागेवर जाऊन काढलेली जवळपास 200 ओरिजिनल जलरंगातील निसर्गचित्रे पूर्णपणे बेचिराख झाली. ही ओरिजनल चित्रे पावसामुळे पूर्णपणे धूवून गेली. मॅप्रोच्या मालकांनी कोणतीही मदत केली नाही.  उलट सर्वच्या सर्व चित्रांचा कचरा ताबडतोब उचलला नाही तर दुसऱ्या दिवशी रस्त्यावर टाकला जाईल अशी धमकी दिली…  आणि पूर्ण देखील केली… आणि जी अवहेलना  केली ती मनाच्या पटलावर एखाद्याने चाकुचे अनेक वार करावे तशी जखम करुन गेली .

अतिशय कष्टाने काढलेली मूळ चित्रे धुळीस मिळाल्यामुळे जगण्याचा आधारच संपला. राहायला घर नाही, जगण्यासाठी पैसे नाहीत, घरातून सकारात्मक प्रतिसाद नाही, अशा परिस्थितीत सगळीकडे निराशेच्या अंधाराने मनाला ग्रासून टाकले, मनात काळ्या ढगांची काळीकुट्ट गर्जना सतत येत राहू लागली आणि मग सर्व पसारा आवरून मी मुंबईला गेलो.  तिथे नालासोपारा येथे माझ्या एकुलत्या एक मुलीचा डॉक्टरांच्या चुकीच्या दिलेल्या इंजेक्शनमूळे मृत्यू झाला आणि खऱ्या अर्थाने मी पूर्णपणे धुळीस मिळालो, पूर्णपणे खचलो.

आणि मग जगण्यात राम नाही, मजा नाही.. सर्व ठिकाणी निराशाच निराशा पदरी पडल्यामुळे मग जगायच तरी कसे ? कशासाठी ? असे संघर्षमय जीवन किती वर्ष जगायचे ? सततच्या संघर्षाचाच मला खूप कंटाळा आला म्हणून मी मनातल्या मनात आत्महत्या करण्याचे नक्की केले.

पाचगणी क्लबच्या समोरच मुख्य रस्त्याला लागूनच छोट्या रस्त्यावर सेंट पीटरचे चर्च आहे त्या चर्चच्या पाठीमागे अँग्लो इंडियन ख्रिश्चन लोकांची दफनभूमी आहे . येथील परिसर अतिशय शांत आणि निसर्गमय आहे. पाचगणीचा शोध ज्या ब्रिटिश अधिकाऱ्याने लावला त्या जॉन चेसन याची दफन केलेली दुर्लक्षित समाधी येथे आहे. माहीत नाही पण आत्महत्या करण्यापूर्वी त्या थडग्याचे दर्शन घेऊन आत्महत्या करण्याचे मी नक्की केले होते.  दुपारी दोनच्या सुमारास मी तेथे पोचलो.  ज्या माणसाने पाचगणीचा शोध लावला, असंख्य फळाफुलांची ,सिल्वर वृक्षांची झाडे लावली ,कॉफी, बटाटे, स्ट्रॉबेरी यांची लागवड केली, या ठिकाणी पहिला बंगला बांधला, या परिसराचा संपूर्ण अभ्यास करून हिल स्टेशनला लागणाऱ्या सर्व सुधारणा केल्या, गाईड बुक लिहिले , ब्रिटिशांच्या मुलांसाठी इंग्रजी माध्यमाच्या शाळा सुरू केल्या, त्या महान जॉन चेसनची दफनभूमी मात्र उघड्यावरच अनेक ऊनपावसाळे झेलत मलूल पडलेली होती. गवताच्या व काट्याकुट्यांच्या मध्ये कधीही साफसफाई नसल्याने नीट दिसतही नव्हती .

मी थोडी बसण्यासाठी जागा साफ केली व डोळे मिटून जॉन चेसन बरोबर बोलत राहिलो . त्याची व माझी पाचगणीकरांनी केलेली दुर्लक्षित अवस्था सारखीच होती. अचानकपणे डोळ्यातून अश्रूंच्या धारा वाहत होत्या. या निर्जनस्‍थळी मी पूर्णपणे ध्यानस्थ होऊन एकरूप झालो होतो. मला कशाचेही भान राहिले नव्हते.  कितीतरी वेळ मी तसाच सुन्न बसून होतो….  आणि… अचानकपणे कोणीतरी खांद्यावर हात ठेवल्याची जाणीव झाली. डोळे उघडले आणि पाठीमागे पाहिले तो माझा मित्र आयझॅक सिंग दिसला. आयझॅकने मला कडकडून मिठी मारली. माझे डोळे पुसले, माझे सांत्वन केले, आणि माझी निराशेची पूर्ण कथा मनापासून ऐकली.

आयझॅक पाचगणीत कम्प्युटरचे प्रायव्हेट क्लासेस चालवायचा. संगणक व त्याचे शास्त्र याची त्याला खूप माहिती होती. सर्वांना फार प्रेमाने तो शिकवायचा . मी चित्रकार असल्याने कॉम्प्युटरवर चित्र, स्केचिंग काढायला प्रोत्साहन द्यायचा. फुकट शिकवायचा आणि एखादे सुंदर स्केच झाले की खूप कौतुक करायचा. सर्वांना अतिप्रेमाने शिकवत असल्यामुळे अनेक देशी, परदेशी विद्यार्थी त्याच्या क्लासमध्ये आवडीने येत असत. तो सतत बिझी असायचा. चालताना देखील धावत धावत चालायचा… आयझॅक खूप गमतीशीर पण विनोदी माणूस होता.

– क्रमशः भाग पहिला. 

© श्री सुनील काळे

संपर्क – 32, निसर्ग बंगला, मेणवली रोड, स्वप्नपूर्ती मंगल कार्यालयाजवळ, मु .पो. भोगाव, ता. वाई, जि.सातारा – ४१२८०३. 

मोब. 9423966486, 9518527566

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ स्थूलपणाची ऐशी की तैशी… ☆ श्री मेघ:श्याम सोनावणे ☆

श्री मेघ:श्याम सोनावणे

? मनमंजुषेतून ?

☆ स्थूलपणाची ऐशी की तैशी… ☆ श्री मेघ:श्याम सोनावणे

एक काळ होता जेव्हा म्हणत असत की ‘पैसा गेला – काही नाही गेलं, तब्बेत गेली – काही तरी गेलं, चारित्र्य गेलं – सर्व काही गेलं’ (money lost- nothing lost, health lost- something lost, charector lost – everything lost).

आता परिस्थिती बदलली आहे. कोरोना नंतरच्या काळात तर ती प्रकर्षाने जाणवू लागली आहे व वरील सुभाषितामध्ये ही बदल झाला असून ‘वर्तणूक गेली- काही तरी गेलं, तब्बेत गेली तर सर्व काही गेलं’ अशी आता परिस्थिती आहे.

तुमच्याकडे पैसा असेल, वर्तणूक ही चांगली असेल पण तुमची प्रकृती (तब्बेत/हेल्थ) चांगली नसेल तर त्या पैशाचा, वर्तणूकीचा तुम्हाला काहीच फायदा नाही. तुमची प्रकृती खराब झाली तर तुमच्या चांगल्या वर्तणुकीमुळे तुमचा वशिला लागेल, चांगल्या दवाखान्यात तुम्हाला दाखल ही करता येईल, तेथील महागडा खर्च ही तुम्ही पेलू शकाल, पण तुमच्या शरीरावर होणाऱ्या औषधांच्या माऱ्याचे दुष्परिणाम ही तुम्हाला भोगावे लागतील. कोरोना काळात रेमिडीसीयर सारख्या औषधांनी अनेकांचा जीव वाचला पण त्यांच्या दुष्परिणामांनी त्या रुग्णांची रोगप्रतिकारक शक्ती कमी झाली‌ हे सर्वश्रुत आहेच. 

आजकाल आपलं खाणंपिणं ही असुरक्षित झालं आहे. उत्पन्न जास्त व्हावे यासाठी औषधांच्या फवारणी व रासायनिक खतांच्या वापरामुळे शेतात उत्पादन होणारे धान्य हे सदृढ शरीरासाठी पोषक राहीले नाही व त्याने वेगवेगळ्या आजारांना निमंत्रणच दिले जात आहे. विशेष म्हणजे ते उत्पादन करणारे शेतकरी ही हेच अन्न खातात व त्यांच्यावर ही विपरीत परिणाम होतातच. खाद्यतेलांमधील भेसळ, फळे लवकर पिकावीत म्हणून त्यांच्यावर करण्यात येणाऱ्या रासायनिक प्रक्रियांमुळे फळे ही स्वस्थ शरीरासाठी सुरक्षित राहीले नाहीत. दूध वगैरे इतर पेय, बहुतेकांच्या आवडीची आईस्क्रीम, चॉकलेट्स ही यापासून सुटलेले नाहीत, त्यामुळे आपल्या जगण्यासाठी आवश्यक असलेल्या सर्वच घटकांपासून आपल्या शरीरस्वास्थ्याला हानी पोहोचत आहे. त्यात जनसामान्यांप्रति असलेल्या नैतिकतेचा अभाव सामाजिक स्वास्थ्य बिघडवण्यास कारणीभूत होत आहे. 

जगण्यासाठी अन्नधान्य आवश्यक आहे म्हणून ते टाळता तर येणार नाही. सतत बाहेरचे, भोजनालयांतील अन्न, फास्ट फूड, पिझ्झा बर्गर सारखे स्वस्थ शरीरासाठी तेवढे आवश्यक नसलेले अन्न/पदार्थ खाऊन लहानांपासून मोठ्यांपर्यंतची शरीरे कमकुवत व जाड, बेढब होत आहेत. अकाली मृत्यू चे प्रमाणही वाढत आहे. रोगप्रतिकारक शक्ती कमी झाल्याने कर्करोग व इतर साथीच्या रोग व विविध व्याधींचा प्रादुर्भाव वाढत आहे. परवा सामायिक केलेल्या लेखाप्रमाणे डॉ. नितू मांडके, डॉ. गौरव गांधींसारखे कमी वयात हृदयविकाराच्या झटक्याने दगावणाऱ्यांची संख्याही वाढत आहे व त्यांच्यावर अवलंबून असलेल्यांची परिस्थिती व भविष्य अंधारात आहे. घरातील सदस्य व वयस्कांच्या प्रकृतीच्या तक्रारींमुळे घरातील आर्थिक स्थिती ही बिघडत आहे.      माणूस पैसा कमावण्यासाठी आयुष्यभर धावतो व तब्बेत खराब करून घेतो आणि मग मेहनतीने कमावलेला पैसा तब्बेत ठिक करण्यावर घालवतो. 

या सर्वांवर मात करण्यासाठी आपण आपल्या प्रकृतीची शक्यतो काळजी घेणे, तब्येत सांभाळणे, शरीर सुदृढ व रोगमुक्त कसे राहील याविषयी लहानांपासून थोरांपर्यंत सर्वांनी सतत प्रयत्नशील राहणे एवढेच आपल्या हाती आहे.

व्याधींचे अस्तित्व नाही असे घर शोधून ही सापडणार नाही. माझे ही खानपानावर नियंत्रण नसल्याने माझे ही वजन वाढत होते. आनुवंशिकतेमुळे उंची कमी व वजन ९६ किलो झाल्यामुळे माझे दोन्ही पायांचे गुडघे खराब झाले होते. चालणे अशक्य व खूपच त्रासदायक झाल्याने १६ ऑक्टोबर २०१८ रोजी माझ्या दोन्ही गुडघ्यांवर शस्त्रक्रिया करून गुडघेबदल (जॉइंट रिप्लेस) करुन स्टील चे पार्ट बसवण्यात आले. एका पायाला पंचवीस व दुसऱ्या पायाला सत्तावीस टाके घालण्यात आले होते. त्यांचे एक्स रे चे फोटो व गुडघ्यांवर झालेल्या शस्त्रक्रियेचे वण माझ्या स्टेटस ला ठेवलेल्या फोटोत दिसतात. 

माझेही वय आता साठ आहे. उंची १५५ से. मी. त्यानूसार माझे वजन ५५ ते ६० किलो असायला हवे पण ते वाढत ९६ चे ९८ झाले. मी दररोज सकाळी सहा व सायंकाळी सहा कि. मी. असे बारा किलोमीटर चालत होतो. यामुळे वजन वाढत नव्हते, पण कमी ही होत नव्हते. पाऊस, थंडी व कंटाळा ने यात खंड पडत असे. वजन कमी करण्यासाठी मी मध-निंबू, उपाशी राहणे, पंधरा दिवस अन्न न घेता फक्त रस (ज्यूस) पिऊन राहणे, असे इतरही बरेच प्रयत्न करून पाहिले पण वजन काही कमी होत नव्हते. कंटाळून चालणे ही बंद झाले होते. शेवटी मी दैवावर हवाला ठेवून दिवस कंठत होतो. शरीर अजुन स्थूल झाले होते. (स्टेटस ला ठेवलेल्या फोटोत बघून कल्पना करू शकता). चालतांना मला धाप लागत होती व जीना चढाउतरायला त्रास होत होता. पोटाचा घेर वाढल्याने मला उभे राहिले तर माझे पाय दिसत नव्हते‌.  मोजे- बुट (सॉक्स- शूज) घालायला खूपच त्रास होई. मोजे घालतांना पोट दाबले जावून गळ्यापर्यंत येत असे‌.  सर्वच कपडे मला घट्ट होत असत. स्थूलपणा ची लाज वाटून कामाव्यतिरिक्त मी बाहेर जाणे टाळत होतो. घरातच राहिल्याने हळूहळू नैराश्य मला घेरायला लागले होते. दररोज सकारात्मक कथा लोकांना पाठवायचो पण मन निराश व्हायला लागले होते. 

आधी आमच्या शेजारी राहणाऱ्या एका मित्राची पत्नी, वय वर्षे तीस, पण ती ही स्थूल होती. माझे बघून तिने ही वजन करायचे सर्व प्रयत्न करून झाले होते पण त्यांनाही फरक पडला नव्हता. नंतर ते दूर रहायला गेले. त्यांनंतर त्यांना वजन कमी करण्याच्या खात्रीलायक प्रकाराविषयी माहीत झाले व त्यांनी ते अंमलात आणले. स्वतः अनुभवून मित्राचे दोन महिन्यांत दहा व पत्नी चे सहा महिन्यांत पंचवीस किलो वजन कमी झाल्यावर ती दोघे आमच्याकडे आली. मी त्यांना बघून आश्चर्यचकित झालो. 

जेवण बंद न करता, आहार नियंत्रण करून सकस आहाराच्या मदतीने व घरातल्या घरात नियमित व्यायाम करुन कमी दिवसांत वजन घटवण्याच्या या पद्धतीविषयी त्यांनी मला माहिती दिली. भविष्यात आजारी पडून त्रास, मनःस्ताप भोगण्यापेक्षा शरीर स्वस्थ, निरोगी करून व्याधीमुक्त जीवन जगण्याचा आनंद देणारा हा सहज साध्य असलेला व्यायाम प्रकार मला उत्तम वाटला व त्यांच्या मार्गदर्शनाखाली मी ही पद्धत अवलंबली.

आहार नियंत्रण, सकाळ व संध्याकाळ असे दोन वेळा व्यायाम व दोन वेळा सकस संतुलित आहाराच्या मदतीने सुरुवातीच्या काही दिवसांतच मला खूप हलके वाटू लागले व उत्साह वाढून पहिल्या महिन्यात माझे आठ किलो वजन कमी झाले. दूसऱ्या महिन्यात सात, तिसऱ्या महिन्यात पाच व पुढील पंधरा दिवसांत तीन असे साडेतीन महिन्यांत एकूण तेवीस किलो वजन कमी झाले. पोटाचा घेर अगदीच कमी झाला (स्टेटस ला असलेल्या फोटोत बघू शकता) व स्वतःला खूप उत्साही, स्वस्थ व हलकं वाटू लागले. माझे सर्वच कपडे आता ढिले होऊ लागले. माझ्यातील झालेला हा बदल बघून माझे इतर मित्रही अचंबित झाले व त्यांनीही ही पद्धत अवलंबली आणि घरातल्या घरात राहून वजन घटवायला त्यांनी सुरुवात केली आहे.

हे फक्त वजन घटवण्यास उपयोगी नसून ज्यांचे वजन कमी आहे व त्यामुळे त्यांना त्रास किंवा चेष्टा, उपेक्षेला सामोरं जावं लागतं, त्यांना ही यातून फरक पडतो. आपली रोगप्रतिकारक शक्ती वाढते. सकारात्मक भावना वाढीस लागते.

या सोप्या व्यायामांमुळे थायराईड, ॲसिडिटी, अपचन, मायग्रेन, महिलांमधील पी. सी ओ. डी. चा त्रास ही कमी झाल्याची अनेक उदाहरणे आहेत. बऱ्याच स्त्रियांना स्थूलपणामुळे संतती होण्यास अडचण  येते. त्यांचे वजन कमी झाल्यामुळे हा अडसर निघून संतती झाल्याचीही उदाहरणे आहेत. 

बरेचसे आजार हे वाढलेल्या पोटामुळे होतात. अपचन, वात, गॅस, ॲसिडिटी, मायग्रेन, बद्धकोष्ठता, हातापायाला मुंग्या येणे, अंग दुखी, वाढत्या वजनामुळे कंबरदुखी, पाठदुखी, गुडघेदुखी हे आजार ‘एकावर एक फ्री’ सारखे आपल्या जीवनात प्रवेशात. स्थूलपणामुळे हृदयावरही ताण येतो. रक्ताभिसरण सुरळीत होत नाही. मांडी वाळून बसणे शक्य होत नाही. प्रवास ही नकोसा होतो. 

आपल्या नेहमीच्या दिनचर्येला बाधा न येता दिवसातला आपला एखादा तास घेणाऱ्या या व्यायामाने येणाऱ्या घामामुळे त्वचा निरोगी होते व त्वचेला तजेला येतो तसेच शरीरातील टाकाऊ, विषारी द्रव्ये घामाद्वारे मोठ्या प्रमाणात बाहेर पडल्याने किडनी वरील ताण ही कमी होतो व एकप्रकारे अनायासेच डायलेसिस ची प्रक्रिया पार पडत असल्याने भविष्यात किडनीचे विकार होणे ही टळते.

आपले शरीर असंख्य कोषिका (सेल्स) नी बनलेले असल्याने या विविध व्यायामांमुळे मेटॅबोलिजम वाढल्याने हे सेल्स मजबूत होतात, शरीराचे स्नायूही मजबूत होतात, परिणामी शरीर सुदृढ व निरोगी बनते. 

आपल्यापैकी प्रत्येकाला आज ना उद्या या समस्या व सत्याला सामोरे जावे लागणार आहेच. वजन कमी करणे वाटते तितके सोपे नाहीच पण दृढ निश्चय, मनापासून प्रयत्न, या विषयावरील तज्ञांचे नियमित योग्य मार्गदर्शन व सातत्य ठेवल्याने हे वाटते तितके अवघड ही नाही हे मला उमजले व मी ते करुन दाखवले आणि अजूनही करीत आहे. 

व्यायाम शाळेत ही जाऊन व्यायाम करणे हे ॲलोपॅथी सारखे आहे. कदाचित तुम्ही वजन कमी करू शकता पण व्यायाम बंद केल्यावर साईड इफेक्ट सारखं पुन्हा पहिल्यापेक्षा जास्त वजन वाढू लागते. 

योग करून शरीर स्वस्थ ठेवू शकता पण ते होमिओपॅथी सारखे आहे. फरक पडण्यास खूप कालावधी लागतो. त्यापेक्षा हजारो इच्छुक लोकांप्रमाणे मी अवलंबीत असलेल्या या पद्धतीमुळे लवकर व दीर्घकाळ फरक पडणार असेल तर ते चांगले नाही का? 

आपल्याला जे काही फुकट मिळते त्याचा फक्त आनंद असतो पण त्याची कदर मात्र रहात नाही. लाखमोलाचं हे शरीर ही आपणास फुकट मिळालं आहे. त्यांची काळजी घेण्याऐवजी वाटेल ते खाऊन, पिऊन त्याच्यावर अत्याचार करतो व मग त्रास होऊ लागल्यावर रुग्णालयात पैसे घालवतो. दरमहा असे गोळ्या औषधांवर किती खर्च होतात त्याचा हिशोब केला तर हळूहळू जाणारा हा आकडा मोठा होतो. 

तुमची जर खरंच मनापासून वजन कमी किंवा जास्त करायची व कोणत्याही स्वास्थ्यविपरित परिस्थितीला सामोरे जाण्यास सक्षम असे आपले शरीर स्वस्थ, सुदृढ व निरोगी असावे अशी तीव्र आंतरिक इच्छा असेल तर आणि तरच या विषयावर तुम्ही माझ्याशी संपर्क साधू शकता. आपले वजन खात्रीने कमी होईल याची ‘ आधी केले, मग सांगितले ‘ या उक्तीप्रमाणे मी ग्वाही देतो.

आपणास स्वास्थ्यपुर्ण सुखी समाधानी आयुष्य लाभो यासाठी भरभरून शुभेच्छा. चला तर मग या सुंदर जीवनाला ‘फॅट टू फिट’ असे वळण देऊन अजून सुंदर बनवूया.

© श्री मेघ:श्याम सोनावणे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ “सामान्यांचे कंबरडे…” ☆ श्री सुनील देशपांडे ☆

श्री सुनील देशपांडे

? मनमंजुषेतून ?

☆ “सामान्यांचे कंबरडे…” ☆ श्री सुनील देशपांडे ☆

जगात सगळ्यात ताकदवान कोणती गोष्ट असेल तर ती म्हणजे सामान्यांचे कंबरडे. हे नेहमी मोडण्यासाठीच असतं.  पेट्रोल डिझेलची भाववाढ झाली की सामान्यांचे कंबरडे मोडते.

सिलेंडर चे भाव वाढले की सामान्यांचे कंबरडे मोडते.  दर वर्षी केंद्रात आणि राज्यात अशी दोनवेळा अंदाजपत्रके म्हणजेच बजेट येतात. त्या दोन्ही वेळेला विरोधी पक्षांच्या मते सामान्यांचे कंबरडे मोडलेले असते.  तसं पाहायला गेलं तर मी एक सर्वसामान्य माणूस आहे.  पण कंबरडे हा अवयव कुठे आहे हे मला अजून समजलं नाही.  कंबर आणि त्याच्या जवळपास कुठेतरी तो असला पाहिजे कारण त्याचं नाव कंबर या नावावरून तयार झालेलं आहे असा आपला माझा सर्वसामान्य माणसाचा बाळबोध अंदाज. तर हा कंबरडे नावाचा सर्वशक्तिमान अवयव मी सर्वसामान्य असून सुद्धा मला काही अजून सापडला नाही.  बहुधा तो शरीराच्या आत कोठेतरी दडला असावा.  कारण माझी कंबर दुखते हे माझ्या आई ग ! उई ग ! वरून सगळ्यांनाच समजतं.  परंतु कंबरडं मोडतं म्हणजे काय होतं हे काही अजून मला समजलं नाही. ते मोडत असून सुद्धा पुन्हा ते कसं जोडलं जातं तेही समजत नाही. कारण एकदा मोडल्यानंतर पुन्हा मोडण्यासाठी मध्यंतरीच्या काळात ते जोडलं जाणं आवश्यक आहे.  कारण न जोडता ते पुन्हा मोडणार कसं ? त्यामुळे हा कंबरडं नावाचा अवयव कुठे असतो, तो सतत मोडून सुद्धा कसा जोडला जातो, या साऱ्या चमत्काराची फोड कुणी करत असेल तर मला हवी आहे.  बघा तुम्हाला जमतय का –  हे कबरडं कुठे आहे आणि ते कसं मोडलं आणि जोडलं जातंय हे शोधून काढायला ?

मला कळवा हं तुम्हाला समजलं तर…

© श्री सुनील देशपांडे

मो – 9657709640

email : sunil68deshpande@outlook.com

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ ” काहीपण देगा देवा…” ☆ श्री अमोल अनंत केळकर ☆

श्री अमोल अनंत केळकर

??

☆ ” काहीपण देगा देवा…” ☆ श्री अमोल अनंत केळकर ☆

ज्योतिष शास्त्रासंबंधीत ‘ व्यवसाय जातक’  नावाचे एक पुस्तक वाचनात आहे. यात ‘सुखवस्तू’ लोकांचे ग्रहयोग दिले आहेत. थोडक्यात खूप काही Ambitious नसलेले , आहे त्यात  समाधानी, फारशी रिस्क न घेणारे, परंपरेने आलेला व्यवसाय चालवणारे, मुळ गाव न सोडणारे इ इ लोक्स या वर्गीकरणात येतात. यांच्या पत्रिकेतील ग्रहांचे नाते एकमेकांशी गुण्या- गोविंदाचे असते. उगाच कोण वक्री नसतो, एकमेकांशी स्फोटक केमिस्ट्री नसते ,  शुभ ग्रह खूप चांगले नसतात, पापग्रह खूप त्रास देत नाहीत.दशा ही फारशा वाईट नसतात. जन्म, शिक्षण, नोकरी/व्यवसाय, लग्न, संतती, निवृत्ती, वृधत्व हे चक्र व्यवस्थित पार पडते.

ऍडजेस्टमेंट, फ्लेक्झिबलपणा त्यांच्या रक्तात असतो. पत्रिकेतील बहुसंख्य ग्रह द्विस्वभाव राशींसंबंधित असतात.

त्यामुळे त्यांचा विशेष काही आग्रह नसतो 

थोडक्यात जातकाला आणि ज्योतिषांनाही फारसा ताप न देणारी यांची पत्रिका असते.

” काहीपण ” चालेल हे यांच्या जीवनाचे सूत्र. 

आज नाष्टयाला काय करायचे असे घरी विचारले गेले(च) तर   – “काहीपण” हेच उत्तर ब-याचदा त्यांच्याकडून येते

फिरायला कुठे जायचे – कुठेही, सिनेमा कुठला बघायचा – ‘कुठलाही’ हीच वृत्ती ते कायम ठेवतात.

उद्या हे मंत्री झाले आणि खातेवाटपाच्या वेळीही फारशी किरकिर न करता  ‘काही पण’ चालेल (पण द्या )ही भूमिका ठेवतील.

अशा व्यक्तींसाठी तुकोबांची रचना वेगळ्या शब्दात — 

 

काहीपण देगा देवा

पोहे,मॅगी ,उपमा !

 

जया अंगी ‘काही’पण

तया यातना कठीण !

 

महापूरे झाडे जाती

तेथे ‘काहीपण’ वाचती !

#काहीपण_देगा_देवा

 

  श्री अमोल केळकर

बेलापूर, नवी मुंबई, मो ९८१९८३०७७९

poetrymazi.blogspot.in, kelkaramol.blogspot.com

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ एका सैनिकाच्या पत्नीची वटपौर्णिमा ! ☆ प्रस्तुती – सुश्री प्रभा हर्षे ☆

सुश्री प्रभा हर्षे

??

☆ एका सैनिकाच्या पत्नीची वटपौर्णिमा ! ☆ प्रस्तुती – सुश्री प्रभा हर्षे

(शहीद विक्रांत सबनीस यांच्या सुविद्य पत्नीने २-३ वर्षापूर्वी एका  Blog वर लिहिलेला भावूक लेख)

प्रिय विक्रांत,

कसा आहेस?

मी ठीक. 

सॉरी, काल लिहू शकले नाही. 

काल आपल्या पियुची शाळा सुरु झाली. मागच्या आठवड्यात जमलं नाही, म्हणून काल रात्री तिच्या वह्या पुस्तकांना कव्हर्स घालण्याचा ‘सोहळा’ पार पडला. 

‘सोहळा’च तो! कोऱ्या करकरीत पुस्तकांच्या सुवासाचं अत्तर शिंपडून पार पडणारा ! 

थोडक्यात…म्हणून काल लिहिणं जमलं नाही. 

आज वटपौर्णिमा होती. तू ‘गेल्या’ नंतरची पहिली…. 

काल लोकलच्या डब्यात कुणीतरी विषय काढला.

मी गप्पांमधून अंग काढत ट्रेनच्या खिडकीतून दिसणाऱ्या काळोखात बघत बसले. 

आपल्या लग्नापूर्वी तू सांगितलेला जोक आठवला – वटपौर्णिमेला बायका वडाजवळ काय मागतात ? – ‘वडा-पाव’ ! 

तुझ्या तोंडून प्रथम ऐकला तेव्हा केव्हढी हसले होते मी ! आठवतंय नं ?

आणखी एक प्रसंग आठवला. 

आपलं नुकतंच लग्न झालं होतं. माझ्या एकंदरीत ‘उत्साहावरून’ सासुबाईंनी माझं मन ओळखलं असावं. माझा हात धरून मला सोसायटीतल्या वडाजवळ घेऊन गेल्या. मला म्हणाल्या उद्या सकाळी आपल्याला इथे येऊन पूजा करायची आहे. मी म्हटलं ‘माझा विश्वास नाही’.

तर म्हणाल्या,’या निमित्ताने वडाला नमस्कार करायचा. इतकी वर्ष इथे उभा राहून तो आपल्याला सावली देतोय त्याबद्दल त्याचे आभार मानायचे.

परंपरेपेक्षा मला ही कृतज्ञतेची भावना जास्त भावली.

मी सासूबाईंबरोबर दर वर्षी पूजा करू लागले. 

आज सकाळी पुजेची थाळी घेऊन वडाजवळ गेले. सोबत सासूबाई होत्या. 

वडाजवळ उभी राहिले. बराच वेळ निःशब्द !

अचानक काय वाटलं माहित नाही –

भरल्या डोळ्यांनी आणि थरथरत्या हातांनी वडाला एक salute ठोकला !

Afterall, तू मेजर होतास, विक्रांत !

सासूबाई मला सावरायला म्हणून आल्या होत्या, पण आता त्यांचाच बांध फुटला. 

आधीच सोसायटीतल्या बायकांनी मी तिथे गेल्यामुळे भुवया उंचावल्या होत्या. 

आता तर मला ऐकू जाईल अशी कुजबुज सुरु झाली. 

‘हिला आणायचं का इथे ? सबनीस काकींना तरी कळायला हवं होतं!’

गर्दीतून कोणीतरी हळूच म्हणालं.

माझ्यापेक्षा वयाने मोठ्या असणाऱ्या त्या बायकांशी मला हुज्जत घालायची नव्हती, कारण मी काय करत होते याबद्दल मला विश्वास होता. 

विक्रांत, 

आपण या जन्मात भेटलो खरे –

पण तू ‘मला असा’ किती मिळालास? 

पुढचे सात जन्मच काय- सगळे जन्म तू मला हवा आहेस… 

हे, खरं तर, घरी बसून देखील मागता आलं असतं. 

पण का कोणास ठाऊक, मला वडाजवळ जावसं वाटलं. 

घरातल्या एखाद्या आजोबांसारखा असलेला तो वड माझं म्हणणं शांतपणे ऐकून घेईल असं वाटलं.

त्या दिवशी मला पहिल्यांदा जाणवलं की परंपरा-रूढी, प्रतीकं तुम्ही माना किंवा मानू नका ,

पण तुमच्या एकूण ‘असण्याला’च या सगळ्या गोष्टी चिकटलेल्या असतात. 

तू असतास तर मला वेड्यात काढलं असतंस कारण तुझा या कशावर विश्वास नव्हता. 

पण एक सांगू ? विश्वास-अविश्वास या सगळ्याच्या पलीकडे एक प्रांत असतो.

मी त्याला ‘instinct’ म्हणते. 

भिकाऱ्याला कधीही भीक न देणारे आपण एखादवेळी पट्कन कुणालातरी भीक देऊन मोकळे का होतो, 

याला जसं लॉजिक नसतं तसंच काहीसं. 

अशावेळी आपण फक्त आपल्या ‘instinct’ ने दिलेली आज्ञा पाळत असतो. 

सोळा डिसेंबरच्या रात्री बॉर्डरवर शत्रूशी चकमक झाली. फारशी कुमक जवळ नसताना तू कोणाच्या आज्ञेने लढलास आणि शहीद झालास? 

Vikrant, you just followed your instinct!

वटपौर्णिमेला मला वडाजवळ पूजा करताना पाहून शेरे मारणाऱ्या समाजाबद्दल मला राग नाही, पण गंमत वाटते. 

सो कॉल्ड प्रगतीच्या नावाखाली स्त्रियांच्या हातात सिगरेट आणि दारूचा ग्लास खपवून घेणारा समाज विधवा स्त्रीचा वड पुजण्याचा हक्क नाकारतो. 

आपल्या मुलीबाळी गणेशोत्सवात ‘शीला की जवानी’ म्हणत नाचलेल्या चालतात, पण पिरियड्स चालू असलेल्या स्त्रीला देवघरात यायचा मज्जाव असतो ! 

हा paradox मला मान्य करावा लागतो

तुम्ही ढीग शिका, पदव्या मिळवा, जग जिंका –

माझ्यासारख्या एकट्या बाईला समाजात राहायचं असेल तर जगण्यातल्या या विसंगतीला पर्याय नाही. 

आर्मीत गेल्यानंतर तू आम्हा सिविलीयन्सना नेहमी नावं ठेवायचास. ‘तुम्हाला जगण्याची शिस्त नाही’ म्हणायचास.

नसेल आम्हाला शिस्त. पण इथेही कुठलीही गोष्ट लढूनच मिळवावी लागते.

मी ही रोज लढते….

भ्रष्टाचाराने पोखरलेल्या देशाचं रक्षण करण्यासाठी. माझ्या नवऱ्याने रक्त सांडलं या जाणीवेसह जगत राहण्याबद्दल कुठलं शौर्यचक्र मिळणार नाही हे माहित असून लढते.

पियु, सासूबाई आणि बाबांसमोर कणखर राहण्याचा जो मी ‘अभिनय’ करते त्याबद्दल कुठलंही award मिळणार नाही हे माहित असून लढते. 

आपल्या पियुच्या न संपणाऱ्या प्रश्नांना न कंटाळता उत्तरं देण्याबद्दल कुणी पाठ थोपटणार नाही हे माहित असून लढते.

I am a soldier, I fight where I am told, and I win where I fight!

तूच म्हणायचास ना? 

थांबते. पियुला गोष्ट सांगायची वेळ झाली. 

उद्या भेटू. 

बाय!

लेखिका : (शहीद विक्रांत सबनीस यांच्या सुविद्य पत्नीने २-३ वर्षापूर्वी एका  blog वर लिहिलेला भावूक लेख) 

संग्राहिका आणि प्रस्तुती –  सुश्री प्रभा हर्षे 

पुणे, भ्रमणध्वनी:-  9860006595

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ विचारप्रक्रिया बदलताना… ☆ श्री मकरंद पिंपुटकर ☆

श्री मकरंद पिंपुटकर

? मनमंजुषेतून ?

☆ विचारप्रक्रिया बदलताना ☆ श्री मकरंद पिंपुटकर ☆

मी आज तुम्हाला तीन छोट्या कथा सांगणार आहे.

पहिली गोष्ट आहे चार चाकी गाडी चालवण्याच्या परवान्याची (लायसन्स) परीक्षा देणाऱ्या एका तरुणीची. 

परीक्षक तिला विचारतात, “मी आज तुम्हाला परत तोच प्रश्न विचारतो – समजा तुम्ही एका अरुंद गल्लीतून गाडी चालवत आहात, गल्लीच्या दोन्ही बाजूला लागूनच इमारती आहेत, गाडीव्यतिरीक्त एकच माणूस जाऊ शकेल एवढीच जेमतेम जागा शिल्लक आहे आणि समोर रस्त्याच्या एका कडेला तुमचा नवरा आहे आणि दुसऱ्या साईडला तुमचा भाऊ आहे, तर तुम्ही काय माराल ? What will you hit ?”

गेल्या दोन परीक्षांत याच परीक्षकांनी तिला हाच प्रश्न विचारला होता, दोन्ही वेळा तिने “नवरा” असं उत्तर दिलं होतं आणि तिला नापास केले गेले होते. आज तिनं पवित्रा बदलला आणि ती म्हणाली, “मी विचार बदलला आहे. मी भावावर गाडी घालेन. I will hit him.”

ती आशेने परीक्षकांकडे पहात होती आणि परीक्षकांनी बोलायला सुरुवात केली …

दुसरी कथा आहे एका कारकीर्द समुपदेशकाची – करीअर कौन्सेलरची. संघ व्यवस्थापन – टीम मॅनेजमेंट शिकवण्यासाठी, त्याने आलेल्या सर्व प्रशिक्षार्थींच्या एका हातात प्रत्येकी एक छान टम्म फुगवलेला फुगा दिला आणि दुसऱ्या हातात एक टोकदार टाचणी. 

समुपदेशक सांगत होते, सर्व प्रशिक्षार्थी कान देऊन ऐकत होते, “एक छोटीशी स्पर्धा आहे – दोन मिनिटांपर्यंत ज्याच्या हातातला फुगा फुगलेला राहील तो जिंकला. 

and your time starts now !”

समुपदेशकांनी एवढं म्हटलं मात्र, इतका वेळ पूर्ण शांत असलेला तो हॉल, वीरश्रीयुक्त आरोळ्यांनी दुमदुमून गेला. जो तो दुसऱ्याचा फुगा फोडण्याच्या आणि स्वतःचा वाचवण्याच्या प्रयत्नांत मश्गूल होऊन गेला. 

दोन मिनिटे संपली तेव्हा फक्त तिघा जणांच्या हातातले फुगे शाबूत होते, आता यातील कोणाचा पहिला क्रमांक येणार हे जाणण्यासाठी सर्व उत्सुक होते, आणि समुपदेशकांनी बोलायला सुरुवात केली …

तिसरी कथा आहे मानसशास्त्रात (psychology) पदवी अभ्यासक्रम शिकणाऱ्या धनश्रीची. सध्या, महाविद्यालयीन अभ्यासक्रमाव्यतिरिक्त, ती न्यायवैद्यक मानसशास्त्र (forensic psychology) या विषयाचा एक online course करत होती.

आजची त्यांची नेमून दिलेली कामगिरी assignment दिलचस्प होती – तुम्हाला एक खून करायला सांगितला तर तुम्ही तो कसा कराल याचं एका मिनिटात उत्तर द्यायचे होते. 

मग कोणी, ज्याचा खून करायचा आहे त्याला गाडीतून ढकलून दिले, किंवा त्याचा कडेलोट केला. काहींनी चालत्या रेल्वेसमोर कोणाला ढकललं, काहींनी गोळ्या घातल्या, काहींनी सुरा खुपसून कोथळा काढला. धनश्रीने झोपलेल्या माणसाच्या नाकावर क्लोरोफॉर्मचा बोळा दाबून त्याला बेशुद्ध केलं आणि मग त्याचा प्राण जाईपर्यंत त्याच्या नाकातोंडावर उशी दाबून धरली. 

कोणी सगळ्यात जास्त सराईतपणे खून केला हे जाणून घेण्यासाठी सगळे उत्सुक होते आणि कोर्स इंस्ट्रक्टरने बोलायला सुरुवात केली …

संयम राखत ड्रायव्हिंग परीक्षक सांगत होते, “मॅडम, थोडा कॉमन सेन्स वापरा हो. तुम्ही ब्रेक मारा, hit the breaks. नवऱ्याच्या आणि भावाच्या जीवावर का उठताय ?”

कारकीर्द समुपदेशक सांगत होते, “दोन मिनिटांपर्यंत फुगा फुगलेला राहील, तो जिंकला, असं सांगितलं होतं. दुसऱ्याचे फुगे फोडा असं कुठं म्हटलं होतं ? तुम्ही कोणीच एकमेकांचे फुगे फोडले नसतेत, तर सगळेच जिंकला असतात.”

फोरेन्सिक कोर्सच्या इंस्ट्रक्टरने सांगितलं, “कोणी कसा खून केला हे महत्त्वाचं नाही. प्रश्न हा आहे की तुम्ही कोणीच साधं विचारलंही नाही की मी हा खून का करू ? कोणी असं म्हटलं नाही की मी सैन्यात जाईन आणि शत्रूला मारेन.”  

सध्याच्या या स्पर्धात्मक युगात, आपण जिंकायचं म्हणजे समोरच्याला हरवायचं अशी आपली विचारप्रक्रिया झाली आहे. 

स्वतःच्या प्रगतीसाठी आपण आपल्या कुटुंबीयांचा – आप्तस्वकीयांचाही बळी घ्यायला किंवा द्यायला तयार आहोत, आपल्याच सहकाऱ्यांना पायदळी तुडवून आपला झेंडा उंच ठेवण्यात आपल्याला काहीच वावगं वाटत नाही, कोणतेही कारण न जाणता आपण समोरच्याला आयुष्यातून उठवायलाही तयार आहोत. 

आपली ही तामसी विचारप्रक्रिया बदलायला हवी, नाही का ? शेकडो वर्षांपूर्वीच ज्ञानेश्वर माऊलींनी आपल्यासाठी प्रार्थना केली आहे – आपली दुष्ट बुद्धी नाहीशी होवो, आपले सत्कर्म वाढो, आणि आपण एकमेकांचे शुभचिंतक होवो.

हे असं झालं की मगच ज्ञानोबा माऊली सुखी होतील. 

पण त्यासाठी आपण आपली विचारप्रक्रिया बदलली पाहिजे.

 

© श्री मकरंद पिंपुटकर

चिंचवड

मो ८६९८०५३२१५   

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ जमणार का तुम्हाला असा चातुर्मास? ☆ सुश्री सुनिता जोशी ☆

? मनमंजुषेतून ?

जमणार का तुम्हाला असा चातुर्मास? ☆ सुश्री सुनिता जोशी

एक सहज सुचलेली संकल्पना. १५ दिवसात चातुर्मास चालू होत आहे. आणि आजच दैनिक सकाळ मध्ये वाचनात आले की चातुर्मासातील आरोग्य जपण्यासाठी दिलेला एक उपाय. आणि तो म्हणजे मौन पाळणे किंवा कमी बोलणे. पावसाळ्यात अग्नी मंद झालेला असतो आणि मुख्य म्हणजे चैतन्य मंदावले की ताकद कमी झालेली असते. हा खरा आरोग्याचा नियम आहे. म्हणजे आजकालच्या काळात जेवढे कामासाठी आवश्यक आहे असे बोलणे. तर मुख्य मुद्दा हा आहे की मौन पाळणे. या गोष्टीची सगळ्यात जास्त गरज आहे ती म्हणजे सध्याच्या राजकारणातील वायफळ बडबड करणा-या नेत्यांना. खास करून महाराष्ट्रातील राजकारणी लोकांना.

खरं बघायला गेलं तर आपण निवडून दिलेला नेता किंवा विरोधी नेता हा त्या त्या भागातील लोकांचे प्रश्न, तेथील समस्या, त्या भागातील विकास या सगळ्याशी निगडीत असला पाहिजे. दिवस रात्र त्याच्या मनात माझ्या जनतेने माझ्यावर विश्वास ठेवून दिलेल्या मताची किंमत हवी, जाणीव हवी, मदतीची म्हणजे योग्य सहकार्याची हमी असावी. परंतु कोणताही नेत्याला सध्या याचे काहीही पडलेले नाही. फक्त आणि फक्त तोंड उघडायचे आणि तोंडाला येईल ते बोलायचे. म्हणजे आपण काय बोलतो आहोत याचा विचारच नाही. खूप काही अभ्यास करता येण्याजोगे, काम करता येण्याजोग्या गोष्टी राजकारणी लोकांना करता येण्यासारख्या आहेत. पण त्या सोडून आपण प्रश्नाला उत्तर देत आपली बाजू मांडायची आणि पुन्हा दुस-याला प्रश्न विचारायचा. पुन्हा त्याने त्याचे उत्तर द्यायचे आणि परत प्रश्न. अरे काय चालू आहे हे? 

तुम्ही फक्त जनतेला बांधील असले पाहिजे उत्तरे द्यायला आणि जनतेनेही त्यांना तसेच प्रश्न विचारले पाहिजेत. पण असो. सध्या आपला मुद्दा आहे तो मौनाचा. खरच आजचे गलिच्छ राजकारण टि.व्ही. चालू केला की– याने त्याला असे म्हंटले, त्याने त्याला असे म्हंटले हे ऐकवत नाही, पहावत नाही. मिडियालाही हेच हवे आहे. दिवसभर ब्रेकींग न्यूज म्हणून तेच दाखवत बसायचे आणि गैरसमज वाढवायचे. कोणताच पाचपोच उरलेला नाही. कोणतीच अभ्यासपूर्ण कृती नाही. विकासाची कोणतीच दिशा नाही आणि जनतेचे भले कुणालाच पचत नाही. अशी सगळी अवस्था झाली आहे. काय आदर्श ठेवणार आहोत आपण पुढच्या पिढीसाठी याची भिती वाटते आहे.    

म्हणून माझी विठुरायाच्या चरणी आषाढी एकादशी निमित्त एकच प्रार्थना आहे की या बडबड करणा-या राजकारण्यांना निदान चातुर्मासातील चार महिने तरी मौन पाळायची बुध्दी दे. त्यामुळे मिडीयावालेही मौन पाळतील आणि आमच्यासारख्या आशेने त्यांच्या कडे पहाणा-या जनतेला थोडे दिवस तरी विकासाचे, सुखाचे येऊ देत.

© सुश्री सुनीता जोशी

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ “इच्छामरण…” – भाग-२ ☆ सुश्री मंजुषा सुनीत मुळे ☆

सुश्री मंजुषा सुनीत मुळे

? मनमंजुषेतून ?

☆ “इच्छामरण…” – भाग-२ ☆ सुश्री मंजुषा सुनीत मुळे ☆

( फार मोठी चूक करत होतो मी–आणि त्यासाठी त्या सगळ्या थोर पुरुषश्रेष्ठांची अगदी मनापासून क्षमा मागतो मी ताई…) -इथून पुढे.

‘ पण मग, धर्माचा आधार न घेताही, आपल्याला असणा-या असाध्य, असह्य अशा शारिरीक व्याधींपासून सुटका करणारा दुसरा कोणताच मार्ग शिल्लक नाही म्हणून कुणी मरणाची इच्छा केली तर त्यात फार काही वावगे आहे असे नाही, असे माझे म्हणणे आहे. ’  

‘ अर्थात् अशा इच्छामरणासाठी काही अटी असाव्यात, जसे की, त्या व्यक्तीला खरोखरच दुर्धर असा आजार आहे, जो औषधोपचारांना दाद देत नाही आहे, आणि कधीच देणार नाहीये, पुरेसा काळ त्या व्यक्तीवर योग्य ते व जास्तीत जास्त शक्य ते सर्व उपचार करून झालेले आहेत आणि आता केवळ मरणाची वाट पहात सहनशक्ती पणाला लावणे एवढेच करण्यासारखे आहे. या सर्व गोष्टी पडताळून पाहून त्यांची खातरजमा करण्यासाठी तज्ञ डॉक्टरांची अधिकृत समिती सरकारने स्थापन केलेली असावी, ज्यांनी अशा व्यक्तीच्या प्रकृतीची त्रयस्थपणे पूर्ण तपासणी करून, आजारपणाच्या दुर्धरतेबद्दल खात्रीपूर्वक दुजोरा दिलेला असावा. आजारी माणसाने पूर्ण शुद्धीवर असतांना, त्रयस्थ साक्षीदारांसमोर आपली मरणेच्छा आपणहून मनापासून जाहीर केलेली असावी. किंवा आजारी माणूस पूर्ण बेशुध्दावस्थेत बराच काळपर्यंत असेल, आणि त्यातून बाहेर येऊन तो काही बोलेल याची डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार अजिबात शक्यता नसेल, तर त्याच्या अगदी निकटच्या अशा मुला-माणसांनीही केवळ त्या व्यक्तीवरील प्रेमापोटी याबाबत विचार करण्यास हरकत नसावी. पण त्यांच्या या विचारामागे कोणतेही आथिक किंवा इतर व्यवहार गुंतलेले नाहीत याची स्वतंत्रपणे, अगदी  व अधिकृतपणे शहानिशा करण्याची तजवीज कायद्याने केलेली असावी.’

‘ सर्वात महत्त्वाचे म्हणजे, इच्छामरणाला परवानगी देण्यापूर्वी, ज्याला मरायचे आहे, त्याचीच फक्त तशी इच्छा आहे, इतर कोणाचीही नाही, याची पूर्ण खात्री करून घेणे सर्वात जास्त आवश्यक आहे. अर्थात् मरणासन्न अवस्थेत नेऊन पोहोचविणा-या ‘असाध्य’ शारीरिक व्याधीतून सुटण्यासाठीच केवळ ‘इच्छामरण’ हा पर्याय मान्य करता येण्याजोगा आहे. म्हणजेच कोणत्याही कारणामुळे आलेल्या मानसिक वैफल्यातून केलेल्या आत्महत्येला कधीही इच्छामरण म्हणता येणार नाही हे सर्वप्रथम स्पष्ट असावे…‘

बोलता बोलता हा भाऊ जरा थांबल्यावर दुसरा भाऊ लगेच बोलायला लागला. पहिल्याचे बोलणे एकदम खोडून काढत तो म्हणाला की …. ‘ कारण कोणतेही असले आणि कितीही नियमांमध्ये व अटींमध्ये बसत असले, तरी इच्छामरण म्हणजे शेवटी आत्महत्याच, जी अजिबात समर्थनीय नाही. जन्म आणि मृत्यू या दोन्ही गोष्टी माणसाच्या हातात नाहीत. जन्माबद्दल तर काही प्रश्नच नाही, पण मृत्यूसुध्दा माणसाने असा ठरवून मागून घेणे, जरी शक्य असले तरी, अजिबात बरोबर नाही. कारण जन्माला येतांना जेवढ्या श्वासांची शिदोरी त्याने बरोबर आणली होती तेवढे श्वास घेऊन झाल्याशिवाय मरणे म्हणजे आत्म्याला अगदी ठरवून अतृप्त भरकटत ठेवण्यासारखे आहे. जे भोग भोगण्यासाठी हा जन्म मिळाला आहे, ते सर्व भोगल्याशिवाय मरण येऊच नये. ईश्वरी इच्छा नसतांना, स्वत:च्या इच्छेने मरण यावे यासाठी प्रयत्न करणे हे मोठे पापच आहे. म्हणून कुणालाही इच्छामरणाची मुभा नसावी. मरणासन्न असणा-या आजा-यालाही मरणाचा योग येईपर्यंत मरणयातना सोसण्याचा भोग भोगायलाच हवा, आणि हो, त्याची सेवा करणा-यांनीही, अशी सेवा करणे हा त्यांचा भोग आहे असे समजून शांतपणे सेवा करीत रहावे. इच्छामरण हा विचारही नको. ’ 

दोन सख्ख्या भावांच्या  या दोन टोकाच्या विचारांवर विचार करता करता माझे मन मात्र तिसरीकडेच भरकटत होते. आपल्या आजूबाजूचे आजकालचे भीषण वास्तव पहाता, सर्व जीवनावश्यक वस्तूंमधली सर्वात स्वस्त व सहजपणे उपलब्ध होणारी वस्तू म्हणजे ‘माणसाचा जीव’…. असे माझ्यासारख्या सर्वांनाच  जाणवत असेल. कितीही काळजीपूर्वक आणि पूर्ण सुरक्षित वाटणारी कायदेशीर तरतूद करून, सर्वसमावेशक अटी घालून, इच्छामरणाला अधिकृत परवानगी जरी दिली, तरी, हे नियम पाळले असे भासवण्यासाठी आवश्यक तो भ्रष्टाचार करून, एखाद्या व्यक्तीने इच्छामरण स्वीकारले असल्याचा देखावा निर्माण करून, आपल्या स्वार्थासाठी त्याला जिवे मारायचे आणि स्वत:च छाती पिटत त्याची अंत्ययात्रा काढायची, अशी नवीच कायदेशीर पळवाट तर गुंडांना मिळणार नाही ना, हीच भीती माझ्या मनात सर्वप्रथम आली. आणि इच्छामरणाला परवानगी म्हणजे एखाद्या असहाय्य जीवाला आपल्या असाध्य दुखण्याच्या यातनांमधून सोडविण्याची मुभा, एवढाच अर्थ न रहाता, ‘ नको असणा-या कोणालाही खात्रीशीर ‘संपविण्याचा’ कायदेसंमत राजमार्ग ‘ असा त्याचा सोयीस्कर वापर होण्याचा फार मोठा धोका त्यात आहे हे मला प्रकर्षाने जाणवून गेले. ‘मन चिंती ते वैरी न चिंती’ म्हणतात ते असं ! पण तरीही, माझ्या आईसारखी प्रकृतीची अवस्था असणा-यांना, माणुसकीच्या नात्याने, निव्वळ प्रेमापोटी – दयेपोटी इच्छामरणाची परवानगी असायला हवी हा विचार आधी वाटला तेवढा क्रूरपणाचा नाही, या विचाराकडे मात्र माझे मन नकळतच झुकू लागले होते.

आईबद्दल हा असा विचार मनात येताच, बोलणे तिथेच थांबवून मी झटकन् उठून खोलीकडे निघाले, तर नर्स आम्हाला बोलवायलाच येत होती. डॉक्टर आधीच आईजवळ पोहोचले होते. आम्हाला पाहताच डॉक्टरांनी नजरेनेच आम्हाला सत्य सांगितले. आमची आई आम्हाला कायमची सोडून गेली होती. तिच्या मरणेच्छेवर आम्ही विचारांचा खल करत बसलो होतो, पण देवाने मात्र तिची ती मनापासूनची इच्छा अखेर पूर्ण केली होती.

मनाच्या त्या अतीव दु:खी आणि हतबल अवस्थेतही मला प्रकर्षाने वाटून गेले की खरंच, मुलांना कधीही कोणताही त्रास व्हायला नको यासाठी आयुष्यभर दक्ष असणा-या आईने, आत्ताही ती काळजी घेतली होती. डॉक्टरांनी आमच्यासमोर टाकलेला जीवघेणा पेच, आम्ही त्यात अडकून गेलोय् हे पाहून, तिनेच नेहेमीसारखा सहजपणे सोडवून टाकला होता. आता आम्हाला करण्यासारखे काहीच उरले नव्हते…….

… तरीही मनात एका प्रश्नाचा भुंगा फिरायला लागलाच होता…… आईच्या मृत्यूला ‘ नैसर्गिक मृत्यू ‘ म्हणायचे, की …. तिच्या अंतर्मनात ठामपणे घर करून राहिलेल्या मरणाच्या विचाराचा विजय झाल्याने आलेले हे प्रामाणिक आणि अगदी मनापासूनचे “ इच्छामरण “ म्हणायचे हा ?????

– समाप्त –

प्रस्तुती : सुश्री मंजुषा सुनीत मुळे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares