मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ “जर मी… तू असते, आणि तू… मी असतास…” – हिन्दी लेखिका / कवयित्री : नादिरा बब्बर ☆ प्रा.भारती जोगी ☆

प्रा.भारती जोगी

? मनमंजुषेतून ?

☆ “जर मी… तू असते, आणि तू… मी असतास…” – हिन्दी लेखिका / कवयित्री : नादिरा बब्बर ☆ प्रा.भारती जोगी ☆

तर… प्रेमाची मितीच बदलली असती.

प्रेमातील दिवसांचे रूपच वेगळं असतं.


तू… तळमळत काढली असतीस आख्खी रात्र, आणि मी… गाढ झोपले असते.

तू… रात्रभर अश्रू गाळत बसला असतास, आणि मी आनंदात, हसत!


तेव्हा तू पत्र लिहिलं असतस, आणि मी… मी ते असच कुठेतरी पडू दिल असतं… विसरून ही गेले असते.

तू… एकटा, एकाकी उभा… खिडकीतून बाहेर बघत… आणि मी..


मी… रात्र रात्र मित्रांच्या मैफिलींमध्ये रंगून जात, त्यांना मोहवत, त्यांची भुलावण करत राहिले असते.

चूक माझी असतांनाही, तू माफी मागितली असतीस.

तेव्हा मी… आणखीनच ताठ होत, ऐट दाखवली असती.

 *जर मी… तू असते, आणि तू मी असतास… तर.. *.


तू आनंद, दु:ख, लज्जा… सगळी गुपिते कानी घातली असतीस माझ्या

आणि मी… मी ती उडवून लावली असती हवेत… निष्ठुर, भावनाहीन, बेपर्वा होऊन.


जेव्हा एकटेपणा असह्य होऊन तू कोसळला असतास पायावर माझ्या

मी… मोठ्या ताठ्याने तूला शहाणपण शिकवलं असतं.

तुझ्या छोट्या छोट्या गोष्टींचं कारण पुढे करत… रोज तुझ्या पासून, थोडी थोडी दूर होत गेले असते मी.


जर तू स्वाभिमानाची लाज राखण्यासाठी म्हणून माझ्याशी बोलला असतास ; तर…

मी… मौन धारण करून सुटका करून घेतली असती माझी.

 *जर मी तू असते, आणि तू मी असतास*

*तर… मितीच बदलली असती प्रेमाची*

जेव्हा तू नाईलाजाने माझी प्रत्येक गोष्ट मानून तडजोड केली असतीस

तेव्हा मी माझा हक्क समजून जीवनात आणखीनच मौज-मजा केली असती.

जीवनाच्या प्रत्येक वळणावर तूला माझी उणीव भासली असती.

पण मला तुझी प्रतिमा, माझ्या परिघात खूपच छोटी वाटली असती.


तू काही सांगत असतास तर मला ते ऐकूच आलं नसत.

तू वारंवार आला असतास, पण मी बोलावलं नसत तूला.

तू हात पुढे केला असतास… मी माझा हात मागे घेतला असता.

तूला हसावसं वाटलं असतं… मी पुन्हा पुन्हा रडवलं असत.


पण… हे सगळं कसं बरं झालं असत?

हे तर केवळ अशक्य ना??

भाग्यरेखा कशी बरं पुसता येईल?

तू तर तूच रहाणार आहेस, आणि मी मीच…

प्रेमाच्या तारखा, आणि मिती ही तशाच रहाणार…

युगानुयुगांची परंपरा ही… कोण बदलणार??

गा-हाणी… व्यथा… घुसमटलेल्या मनांच्या… कोण ऐकणार???

(नादिरा बब्बर यांच्या और तुम होते मैं या हिंदी कवितेचा स्वैर भावानुवाद!)

अनुवादिका / कवयित्री : प्रा.भारती जोगी.

पुणे. 

 फोन नंबर..९४२३९४१०२४.

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ ती – – – ☆ श्री सुनील देशपांडे ☆

श्री सुनील देशपांडे

? मनमंजुषेतून ?

☆ ती – – – ☆ श्री सुनील देशपांडे

आज मधुबाला हयात असती तर अशी दिसली असती

ती – – – 

आमच्या आईच्या वयाची (आमची नातवंडं आता रोमँटिक सिनेमा पाहायच्या वयात आलीत)

तरीही ती आमची लाडकी रोमँटिक हिरोईन.

तिचं नाक नाजुक आणि धारदार होतं?

छे हो नाजूक कसलं, थोडं जाडंच. धारदार तर अजिबात नाही.

तिचे ओठ नाजूक होते?

ते हो नाजूक कुठले आकाराने सुंदर परंतु थोडे जाडेच नाही का?

जिवणी नाजूक? नाहीच.

डोळे माशा सारखे म्हणजे मीनाक्षी हो! छे ते तसेही नव्हते.

सिंहकटि ? न न् नाही.

मग होतं काय तिच्यात?

आधी तुम्ही ते मासे, त्या चाफेकळ्या त्या गुलाबाच्या पाकळ्या यांचे लोणचे घालून टाका.

सौंदर्याच्या सर्व पारंपरिक कल्पनांना झुगारून देऊन तिने जे आपलंसं केलं

तेच खरं चिरसौंदर्य ठरलं!

ते भावुक, अथांग, काळेभोर डोळे! त्यामध्ये एक खट्याळपणाची झाक!

डोळ्यांचे आणि भुवयांचे विभ्रम!

त्या सुंदर ओठांची मोहक हालचाल!

त्या नाकाच्या शेंड्यावर बेफिकीरपणाची एक झाक!

त्या भव्य कपाळावरून केस सरकवण्यातील एक वेगळीच विलोभनीयता!

त्या निरागस चेहऱ्यावरील खोडसाळ हास्य!

ती अभिनेत्री कधी वाटलीच नाही. तिच्या चेहऱ्यावर जे दिसलं तो अभिनय कधी वाटलाच नाही!

सतत बदलणारे चेहऱ्यावरचे भाव!

संवादातील आणि गाण्यातील शब्दांना न्याय देणारे ते विभ्रम! ती शब्दांची फेक, आणि त्या शब्दांमध्ये मिसळलेली भावगर्भता!

आमचे काही दोस्त त्या विभ्रमांना अदा असे म्हणत!

परंतु एकदा दाखवलेली अदा पुन्हा परत नाही. सतत नवीन नवीन विभ्रम!

एकदा सादर केलेली अदा पुन्हा परत नाही, नो रिपीटिशन!

हाता पायांच्या सर्व शरीराच्या हालचालींमधील सहजता, मोहकता!

निरागसता, खोडसाळपणा, छद्मीपणा या साऱ्यांचं मिश्रण एका मोहक पद्धतीने सतत चेहऱ्यावर जाणवत राहतं आणि मग तेथून नजर हटत नाही.

मधाळ आणि बालिश या दोन्हीचे अफलातून मिश्रण म्हणजेच

मधुबाला!!

तिचा वाढदिवस आणि व्हॅलेंटाईन डे या दोन्हीचे एकाच दिवशी असणे हा मधुनवनीतशर्करा योगच की!

तिचा वृद्धापकाळ काळालाही सहन झाला नसावा म्हणून तरुण वयातच तो तिला घेऊन गेला!

आर्टिफिशियल इंटेलिजन्स च्या एका ॲपवर मी एक इमॅजिनेशन टाकली 95 वर्षाची मधुबाला कशी दिसेल?

पण त्याने उत्तर दिले,

I can’t imagine!

दुसऱ्या एका पला हाच प्रश्न एका वेगळ्या पद्धतीने विचारला

आज मधुबाला जिवंत असती तर कशी दिसली असती ?

त्याने रेखाटलेले चित्र यासोबत मी जोडले आहे.

आज मधुबाला जिवंत असती तर ती ९५ वर्षाची असती!

त्या चिरतरुण स्मृतीला वंदन!

तिच्या आठवांचे सतत मनावर बंधन!

अशी मधुबाला पुन्हा न होणे!!!

म्हणूनच वसंत बापट त्यांच्या कवितेत म्हणाले होते

 

 

मधुबाला ती मधुबाला

मदीरा साकीसंगे जेथे

एकच होतो मधु प्याला

ती स्वर्गाहुन सुखकर म्हणती

कुणी बच्चंजी मधुशाला

नकोत असल्या व्यर्थ जल्पना

सर्व असंभव काव्यकल्पना

तुम्हास तुमची मधुशाला

अम्हास प्यारी मधुबाला

नार अनारकलीसम नाजुक

पडदा दूर जरा झाला

महाल स्वप्नांचा झगमगता

लखलखली चंद्रज्वाला

डोळे दिपता चोरी झाली

दिलदारांची ह्रदये गेली

कठोर काळा दाद न देता

फरार झाली मधुबाला

कुठे हरपली शोधीत बसला

जगात जो तो दिलवाला

स्वप्नामध्ये खळी चाचपून

स्पर्शुन पाही कुणी गाला

अजुन तिला मन शोधीत राही

धुंडुन झाल्या दाही दिशाही

रजतपटावर कितीक झाल्या

मधुबाला ती मधुबाला…

© श्री सुनील देशपांडे 

 फोन :९६५७७०९६४०

 ई मेल : sunil68deshpande@outlook.com

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ प्रियन रंगोत्सव… ☆ तृप्ती कुलकर्णी ☆

तृप्ती कुलकर्णी

🪷 मनमंजुषेतून 🪷

☆ प्रियन रंगोत्सव…  ☆ तृप्ती कुलकर्णी

वैशाख वणव्यातल्या भर दुपारी आपली पहिली भेट झाली. 

आठवतोय त्या भरजरी दुपारचा रंग? 

 

पावसाळ्यातल्या एका संध्याकाळी 

चिंब होऊन झाडाखाली उभी असताना 

तुझी लाल सायकल घेऊन तू माझ्यासोबत थांबलास 

आणि तुझा निळा रेनकोट घालून मला डबलसीट घरी आणलंस… 

त्या वेळेला काळ्या, करड्या, निळ्या, लाल इतक्या सगळ्या ढगांची मोजणी केली होती आपण, ती रंगीत सांज आठवते का तुला?

 

वाढदिवसाच्या दिवशी माझ्या

सायकलच्या कॅरियरवर चाफ्याच्या पिवळ्या फुलांचा पुडा ठेवून गेला होतास तू…

सोबतीला वाढदिवसाच्या शुभेच्छा अशी गुलाबी रंगाची चिठ्ठी… तुझ्या‌ वळणदार पण रंगीबेरंगी हस्ताक्षरातलं ते शब्द आणि त्यावर काढलेलं सुंदर जहाज आठवतं का रे तुला? 

 

इतक्या जवळ राहतो म्हणून कधीच पत्र लिहिता येणार नाही म्हणून चार दिवस हट्टाने मामाकडे गेलास आणि एका पोस्टकार्डवर पत्र लिहून पाठवलंस त्यात शेवटी तुझ्या नावाऐवजी छोटंसं रंगीत घर काढलंस… 

ते घर आजही स्वच्छ दिसतं मला… पण आठवतं का रे तुला? 

 

तुझ्या घर बांधण्याच्या हौसेनं कितीतरी रंगीबेरंगी दगड, विटा, टाइल्स गोळा करायचो आपण,

तेव्हा एका काचेनं माझ्या बोटावर अचूक वार केला होता…‌ त्यातून येणारं रक्त पाहून तुझ्या  आवडीचा पांढराशुभ्र रुमाल माझ्या बोटावर विसावला होता…. अनेक दिवस तुझ्या सॅकच्या चोरकप्यात तो रुमाल ठेवला होतास..आठवतो का रे तुला??

 

इतक्या वर्षांच्या आठवणींमध्ये किती रंगांची उधळण…

गंधाची पखरण…

आठवते का रे तुला? 

चित्रकलेच्या तासाला सर म्हणाले होते काही रंग इतके गडद असतात की ते कधीच पुसले जात नाहीत. त्यावर नवे रंग चढत नाहीत… त्यासाठी कोराच कॅनव्हास वापरावा लागतो. हे ऐकून तुझ्या वहीच्या प्रत्येक  पानावर तू माझ्या आवडीचा हिरवा रंग दिलास… 

हे आठवतं का रे तुला????

 

कदाचित नसेल 

किंवा असेलही…

 पण

प्रियन,

तेव्हापासून मी मात्र पांढऱ्या रंगाचा कागद वापरणं आवर्जून टाळलंय…

 हे या रंगोत्सवाच्या निमित्ताने सांगायचं होतं तुला… 

© तृप्ती कुलकर्णी

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ “सगळंच काही वाईट नसतं…” ☆ शीला पतकी ☆

शीला पतकी 

? मनमंजुषेतून ?

☆ “सगळंच काही वाईट नसतं…” ☆ शीला पतकी 

काल परवा माझ्याकडे संस्थेत कार्यरत असणाऱ्या एका महिलेचा फोन आला. त्यानी माझ्याकडे क्लार्क म्हणून संस्थेचा सगळा पसारा सांभाळला होता. बाई अत्यंत हुशार, बोलक्या, बुद्धीने काम करणाऱ्या आणि संस्थेबद्दल खूप अस्था! आता त्या पुणे मुक्कामी असतात.

त्यांचा मुलगा आहे तितकाच हुशार बारावीला बोर्डात आला आता अमेरिकेमध्ये आहे. बाई आणि त्यांचे मिस्टर यांची वर्षातन एकदा अमेरिका वारी असते. त्यांनी परवा सांगितलेला अनुभव…

 – – त्या म्हणाल्या, ” बाई मी मुंबई एअरपोर्टवर गेले.. तिकीट कलेक्ट करण्याच्या रांगेत उभारलो पासपोर्ट चेकिंगला दिले आणि चेक करणारा माणसाने आम्हाला सांगितले की जरा बाजूला येऊन थांबा… “त्या म्हणाल्या, ” माझ्या काळजाचा ठोका चुकला आता काय झाले? “साधी मध्यमवर्गीय माणसं असं काहीतरी झालं की घाबरणारच ना! त्या म्हणाल्या, पाच मिनिट माझा जीव वर खाली झाला त्या पस्तीस वर्षाच्या माणसाने आम्हाला बाजूला थांबून घेतले व पलीकडच्या रूम मध्ये नेऊन त्याने विचारले की आपण कुठे राहत होता त्यावर बाई म्हणाल्या मी सोलापुरात होते. तो म्हणाला मी तुम्हाला कुठेतरी पाहिले…? बाईंचा जीव थोडासा भांड्यात पडला…! त्या म्हणाल्या मी मोदीत राहत होते. तुम्हाला नाही मी तिथे नाही पाहिले मग त्या म्हणाल्या मी सेवा सदन संस्थेमध्ये बऱ्याचदा गेलेली आहे… कारण त्या आमच्या शाळेचे भांडार चालवत होत्या.. नाही माझा सेवा सदनशी काही संबंध नाही. मग त्या म्हणाल्या मी तडवळकर ट्रस्टमध्ये काम करत होते. मग बरोबर तिथेच मी तुम्हाला पाहिले तुम्ही पानसरे मॅडम आमचा फॉर्म तुम्ही भरला होता.

– – आणि मग तो भरभरून बोलू लागला. ” बाई तडवळकर ट्रस्ट मध्ये माझी दहावी झाली म्हणून आज मी या ठिकाणी आहे नाहीतर माझे काय झाले असते माहिती नाही आज मी या ठिकाणी मॅनेजर म्हणून काम करीत आहे माझ्या आयुष्याला एक चांगली कलाटणी मिळाली ती केवळ नापासांच्या शाळेमुळे शिकलो आज मी 10 कर्मचाऱ्या ंवरती काम करतो तुम्हाला भेटून मला खूप आनंद वाटला, सगळ्या पहिल्या गोष्टी आठवल्या खरंतर मला तुम्हाला चहा वगैरे देण्याची इच्छा आहे परंतु मला एवढा वेळ देता येत नाही” त्याने त्यांची तिकिटे पासपोर्ट वगैरे लगेच दिले.

बाईना इतका आनंद झाला.. की तडवळकर ट्रस्टचे विद्यार्थी आज यशस्वीरित्या आयुष्यामध्ये काहीतरी करत आहेत नापास मुलांना शिकवून काय करायचे? ते काय दिवे लावणार? अशा गोष्टी आमच्या कानावर यायच्या पण त्याकडे आम्ही सगळेच जण दुर्लक्ष करीत असू लोक म्हणायचे सुद्धा व नापास झालेले कुठे पास होत असतात का? पण आम्ही नेटाने ते काम 35 वर्षे चालू ठेवले आणि मग त्याची अशी सुमधुर फळ कुठे कुठे चाखायला मिळतात छान वाटतं आनंद होतो त्यांनी हा किस्सा माझ्याबरोबर शेअर केला आणि तो मी अभिमानाने तुमच्यासमोर मांडत आहे.

– – सगळंच वाईट नसतं सगळंच कधी संपत नसतं आपला विश्वास चांगुलपणावर हवा आणि त्या दिशेने काम करत राहायचं! देणार तो आहे तो काहीतरी चांगली फळे देतोच यावर श्रद्धा ठेवायची…!

© सुश्री शीला पतकी

माजी मुख्याध्यापिका, सेवासदन प्रशाला सोलापूर 

मो 8805850279

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ एन्जॉयग्राफी… ☆ नीला महाबळ गोडबोले ☆

नीला महाबळ गोडबोले

??

☆ एन्जॉयग्राफी… ☆ नीला महाबळ गोडबोले

” पोरींनो, सवडीला दीनानाथला ऍडमिट केलय काल दुपारी.. छातीत दुखत होतं म्हणे तिच्या.. ” 

शाळेच्या व्हॉट्सऍप ग्रुपवर अप्पीचा मेसेज…

अप्पी सवडीच्या शेजारच्या अपार्टमेंटमधे रहात असल्याने तिला ही बातमी कळलेली..

आम्ही सगळ्या नर्व्हस झालो..

सगळ्याजणींनी पन्नाशी पार केलेली.. साठी दृष्टीपथात आलेली..

कुणाच्या रक्तात साखरेचा शिरकाव झालेला, कुणाचं रक्त विनाकारण उसळू लागलेलं, कुणाच्या डोळ्यांनी मोत्यालंकार धारण केलेले, कुणाच्या वेड्यावाकड्या दंतोजीपंतांच्या जागी आता ” कवळी” नामक कुंदकळ्यांची माळ विराजत असलेली…

कुणी जुन्या गुडघ्याला टाटा बायबाय करून नवीन गुडघोजींची स्थापना केलेली..

पण अजूनपर्यंत सगळ्यांची हृदयं तरूण आहेत, असा गोड गैरसमज होता… त्यामुळे ग्रुपचं नाव ” यंग हार्ट्स ” ठेवलेलं…

अन् म्हणूनच आजच्या या सवडीच्या बातमीनं सगळ्यांची काळीजं धडधडू लागलेली…

” सवडीला हृदयाचा त्रास होऊच कसा शकतो? “… हृदयविकार हा ताणतणावामुळे होतो”.. असा आपला आमचा समज..

आणि सवडीचा ताणतणावातल्या “त” शी दूरान्वयानेही संबंध नसलेला..

सवडी… म्हणजे कु. सविता

आमच्या बरोबरच तिने इयत्ता पाचवीत कन्या शाळेत प्रवेश केलेला..

सावळा रंग, कुरळे केस, जाडसर बांधा, चंद्रासारखा गोल गरगरीत चेहरा, तंद्री लागली की अचानक जोडीदाराशी फारकत घेऊन वेगळ्याच मार्गाने जाणारा उजवा डोळा आणि २४*७ चेह-याला धरून राहणारं दिलखुलास हास्य…

मुद्दामहून तिच्याशी मैत्री करावी असं तिच्यात काहीच नव्हतं… पण ती मात्रं सगळ्यांशी जवळीक करायची..

नाव सविता असलं तरी आम्ही सगळ्या तिला ” सवडी ” च म्हणायचो…

“हसणं” हा तिचा ट्रेडमार्क..

कुणी तिच्याशी भांडलं.. तिचा अपमान केला.. शिक्षक तिला रागावले.. तरी ती हसायचीच…

परीक्षेनंतर पेपर वाटपाच्या वेळी.. “सविता.. शंभरपैकी सात मार्क ” असं म्हणत जोशी सर तिच्या हातात पेपर द्यायचे तेंव्हाही ती तो घेऊन हसत हसत बाकावर जाऊन बसायची.. फक्त यावेळी दातांनी ओठ चावलेला असायचा…

परीक्षेच्या वेळी आम्ही सगळ्या पोरी पोतंभर टेन्शनमध्ये पुस्तकं वाचत असायचो.. ही मात्रं निवांत बसलेली.. मैदानातल्या कबुतरांकडं पहात..

” सवडे, अगं तुला परीक्षेचं टेन्शन येत नाही का गं? ” मी तिला विचारायचे.

” टेन्शन घ्यायचं नाही बघ कशाचच, एन्जॉय करायचं ” ती खळखळून हसायची..

शाळेचा पहिला दिवस. पाचवीचा आमचा वर्ग..

मुख्याध्यापक सर तासावर आलेले. त्यांच्या शिस्तीच्या, कडकपणाच्या कथा थोरल्या बहिणींकडून ऐकलेल्या. आम्ही सगळ्या पोरी टरकलेल्या. ओळखीचा कार्यक्रम सुरू झाला..

वर्षा विष्णु काळे

वैशाली अरूण फाटक

संगीता सखाराम कुलकर्णी

मंजुषा सुरेश महाजन

सुनिता विश्वंभर पाटील..

सुनितानं स्वत:चं नाव सांगितलं.. सरांच्या मनात काय आलं माहीत नाही..

” विश्वंभर हे नाव कुणाचं आहे, कोण सांगेल? “

सगळा वर्ग चिडिचूप..

” सर, मी सांगते.. ” सवडीचा हात वर..

” सांगा ” सरांचा करडा स्वर..

” सर.. विश्वंभर नाव आमच्या मावशीच्या चुलतदिराच्या पोराचं आहे. “

” अहो, कुणाचंं म्हणजे कुठल्या देवाचं? “

विष्णुचं नाव आहे हे.. ” सर डोक्याला हात लावत बोलले… तशी सवडी खदाखदा हसली… नि तिच्या पाठोपाठ सारा वर्ग..

एके दिवशी वर्गात सरस्वतीपूजन करायचं अचानक ठरलं. तयारी काहीच नव्हती.

बाजार शाळेच्याच बाहेर..

” सविता, हे पाच रुपये घे. फुलं आणि नारळ सोलून त्याच्या शेंड्या काढून आण.. ” बाईंनी सांगितलं.

पैसे घेऊन सवडी हसत हसत पळत गेली.

दहा मिनिटात हजर.. हातात पिशवी.

पूजा झाली. फुलं वाहिली..

बाई पिशवीतून नारळ काढू लागल्या.

हातात नारळाच्या फक्त शेंड्याच आल्या.

नारळ नव्हताच.

” सविता, नारळ कुठाय? “

” बाई, तुम्ही नारळ सोलून शेंड्या काढून आण म्हणून सांगितलत, मी शेंड्या काढून आणल्या.. सोललेला नारळ तिथेच ठेवला. ” सवडी तोंडावर हात धरून हसू लागली.

बाईंनी कपाळावर हात मारून घेतला..

सातवीची स्कॉलरशिपची परीक्षा..

सवडी काय म्हणून या परीक्षेला बसली, हे तिला नि देवालाच ठाऊक..

परीक्षा केंद्रात नखशिखांत नटलेली सवडी तासभर आधी हजर होती.

” अगं, एवढी नटून का आलीस परीक्षेला? ” बाईंचा प्रश्न..

 

” काही नाही मज्जा, एन्जॉय करायची परीक्षा पण.. ” सवडीचं तत्त्वज्ञान ऐकून आमचे पालकही अवाक्..

गणिताचा पेपर… सवडी वीस मिनिटांत परीक्षाखोलीबाहेर…

शिक्षक, पालक झाडाखाली बसलेले..

” एवढ्या लवकर आलीस? “

” पेपर एकदम सोप्पा होता. सगळा सोडवून झाला. मग बसून काय करायचं? “

पेपर संपला. आम्ही सगळे रडत बाहेर… पेपर भयंकर अवघड. पाच-सात प्रश्न राहिलेले.

” ए, टेन्शन घ्यायचं नाही. एन्जॉय करायचं ” सवडीचा हसत हसत सल्ला…

दोन महिन्यांची रिझल्ट आला.

सवडीला तिन्ही विषयात प्रत्येकी पाच मार्क. शंभरपैकी.. तरी स्वारी जाम खूश..!!

” मला बघा कसे एकसारखे मार्क मिळाले तिन्ही विषयात.. अवघड असतय असं ” म्हणत सातमजली हास्य..

अन् आम्हाला स्कॉलरशिप मिळूनही नंबर जरा मागे गेला म्हणून आम्ही नाराज… तोंड पाडून…!!

चंद्रावर वातावरण कसं असतं?

 हे नववीच्या भुगोलाच्या परीक्षेतल्या

प्रश्नाचं उत्तर सवडीनं…

 

“चंद्रावर पाणी कमी असल्याने काटेरी झुडपं असतात. ससे मोठ्या संख्येनं असतात. “. वगैरे लिहून…

आणि

स्त्राच्या पेपरात…

“अन्न एनस मधून आत घेऊन इसोफॅगसमधून न पचलेलं अन्न बाहेर टाकलं जातं “… अशी एनस व इसोफॅगसच्या कामांची अदलाबदल केलेली भन्नाट उत्तरं लिहून… सा-या वर्गाला तासभर हसवलं होतं नि बरोबरीनं स्वत: हसली होती..

दहावीची परीक्षा झाली.

सुट्टीतच सवडीचं लग्न झाल्याचं कळलं..

शिक्षण, लग्न, मुलंबाळं, करीअर यात तीस वर्षे कशी गेली ते कळलच नाही..

ना कुणाची भेट ना कुणाची खबरबात…

एके दिवशी व्हॉट्स ऐप नामक जादुगारानं आम्हाला पुन्हा एकत्र आणलं..

त्यात सवडीही होती..

झूमवर एके दिवशी सगळ्या भेटलो..

सवडीचा संसार बराच पुढे गेला होता.

तिचा नवरा मोठा सरकारी अधिकारी होता. खूप पैसा मिळवला होता त्याने. पुण्यात मोठ्ठं नि अलिशान घर होतं. तिनं नव-याचा फोटो दाखवला. स्मार्ट नि हुशार दिसत होता.

” तुझ्यात काय पाहिलं गं त्यानं ” स्पष्टवक्त्या गीतानं विचारलं..

” अगं माझ्या हास्यावर भाळला तो.. ” तिचं हसत हसत उत्तर..

आता विषय मुलांवर आला…

” माझा थोरला मुलगा आय. टी. आय झालाय. अमेरिकेत असतो. नि मुलगी सी. ए. झाली. मुंबईत नोकरी करतेय. वीस लाखाचं पॅकेज आहे. ” इति सवडी…

“आय. टी. आय करून अमेरिकेत? “.. या विचारात असतानाच तिच्या शेजारी राहणारीअप्पी बोलली,

” ए बावळट, तुझ्या तेजसनं आय टी आय नाही, आय आय टी केलय.. पवईहून… “

” अगं आय आय टी काय अन् आय टी आय काय… चांगलं शिकला.. चांगला पगार आहे.. मस्त एन्जॉय करतोय.. झालं तर मग! “… सात मजली हास्य..

” तुझी दोन्ही पोरं एवढी शिकली, एवढी हुशार निघाली.. खूप कष्ट घेतले असशील नं तू त्यांच्यासाठी? काय काय केलंस? “.. आमचा प्रामाणिक प्रश्न..

” मी काही केलं नाही; हेच मोठं काम केलं. कधी त्यांच्या मागं लागले नाही अभ्यासासाठी. त्यांना पाहिजे ते करू दिलं. त्यांना फक्त एकच गोष्ट सांगितली होती..

टेन्शन घ्यायचं नाही.. निवांत रहायचं नि एन्जॉय करायचं.. नव-यावर गेलीत गं पोरं माझी.. हुशार.. अभ्यासू आहेत त्याच्यासारखी..!! “

… दाखवलं नाही तरी आम्हाला तिचा हेवा वाटला… आम्हा साऱ्या तथाकथित हुशार मुलींपेक्षा तिचा संसार जास्त यशस्वी होता…!!

एके दिवशी तिचे यजमान वारल्याची दु:खद बातमी आली… जेमतेम अठ्ठावन्न वय..

” हुशार, कर्तृत्त्ववान माणूस.. पण स्वभाव फार गंभीर… नुसता काम करत राहिला आमच्यासाठी. आयुष्य एन्जॉय केलं नाही आजिबात.. म्हणून इतक्या लवकर गेला.. ” आता मात्रं तिचे डोळे वहायचे थांबता थांबत नव्हते…

सहा महिन्यात बिचारी सावरली..

ट्रिप्सना जायचा सपाटा लावला…

नाटक, सिनेमा, गेट टुगेदर्स.. काही म्हणून सोडेना..

बरोबरच होतं.. एकटी कसे दिवस रेटणार होती?

” आता उरलेलं आयुष्य एकटीनं का होईना पण एन्जॉय करणार… ” तिचं स्पष्टीकरण..

अन् आज ही बातमी आली…

तिला हॉस्पिटलमधे हार्टच्या त्रासासाठी ऐडमिट केलेलं..

वाईट वाटत होतं…

दुसरे दिवशी तिला हॉस्पिटलमधे भेटायला जायचं ठरलं सगळ्यांनी मिळून…

रात्री बाराला व्हॉट्सएप मेसेजच्या नोटिफिकेशनची बेल वाजली..

एवढ्या रात्री ग्रुपवर मेसेज?

घाबरत ग्रुप उघडला…

सवडीचा मेसेज होता…

एन्जॉयग्राफी (enjoygraffy) झाली.

काही निघालं नाही. सगळं नॉर्मल..

उद्या घरी सोडतील..

घरीच या सगळ्याजणी..

मस्त एन्यॉय करू…

 

जिनं सगळं आयुष्य “एन्जॉय” या अजेंड्यावर निभावलं.. तिनं “अॅंजिओग्राफी” चं “एन्जॉयग्राफी” केलं तर काय नवल?

तिच्या त्या “एन्जॉयग्राफी” ला हसत नि एन्जॉय करत केंव्हा झोप लागली ते कळलच नाही…!!

 

©  नीला महाबळ गोडबोले 

सोलापूर 

फोन नं. 9820206306,  ई-मेल- gauri_gadekar@hotmail. com; gaurigadekar589@gmail. com

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ वाळवंटातील हिरवळ… ☆ श्री विश्वास देशपांडे ☆

श्री विश्वास देशपांडे

??

☆ वाळवंटातील हिरवळ… ☆ श्री विश्वास देशपांडे ☆

बऱ्याच ठिकाणी लग्नानंतर स्वागत समारंभाचे आयोजन केले जाते. हल्ली त्यासाठी ‘ रिसेप्शन ‘हा इंग्रजी शब्द मोठ्या प्रमाणावर प्रचलित आहे. कधी कोणाचा गौरव सोहळा असतो तर कधी कोणाची एकसष्ठी किंवा एकाहत्तरी किंवा सहस्रचंद्र दर्शनाचा कार्यक्रम अशा विविध कारणांनी असे कार्यक्रम आयोजित केले जातात. अशा कार्यक्रमांना आपण हजेरी लावतो. कार्यक्रम पत्रिकेत उपस्थित राहून आपण कार्यक्रमाची शोभा वाढवावी आणि स्नेहभोजनाचा लाभ घ्यावा असे आवाहन केलेले असते. हे स्नेहभोजन म्हणजे बऱ्याच वेळा बुफे असते.

‘कार्यक्रमास उपस्थित राहून शोभा वाढवावी ‘ असे आवाहन केलेले असल्यामुळे सर्वजण उत्तम प्रकारचा पोशाख घालून अंगावर सुगंधी द्रव्य फवारून अशा कार्यक्रमांना जाऊन खरोखरीच त्यांची शोभा वाढवत असतात. बऱ्याच वेळेला असे कार्यक्रम म्हणजे फॅशन शो सारखे वाटतात. या कार्यक्रमांमध्ये काही ओळखीची बरीच मंडळी भेटते. एखाद्या लांबट टेबलवर पांढरे स्वच्छ आच्छादन घालून निरनिराळे खाद्यपदार्थ आकर्षक पद्धतीने मांडून ठेवलेले असतात. बाजूलाच नव्या कोऱ्या डिश असतात. जणू काही त्या कार्यक्रमासाठी नवीनच आणलेल्या! प्रत्येक डिशवर पेपर नॅपकीन असतो. मंडळी रांगेत उभे राहून आपल्या हाताने आपल्याला हवे ते पदार्थ घेत असतात.

वधू-वरांना किंवा सत्कारमूर्तींना स्टेजवर जाऊन भेटवस्तू द्यायची, शुभेच्छा द्यायच्या आणि यजमानांचा निरोप घेऊन मार्गस्थ व्हायचे असा साधारण हा प्रकार असतो. यजमान बिचारे मनापासून अशा कार्यक्रमांचे आयोजन करत असतात. त्यासाठी आपला वेळ, पैसा आणि श्रम खर्च करत असतात. आपण कार्यक्रमासाठी यावे आणि शुभेच्छा किंवा शुभाशीर्वाद द्यावेत असा त्यांचा प्रामाणिक हेतू असतो. आणि तो मोठ्या प्रमाणावर साध्य होतानाही दिसतो. परंतु अलीकडे अशा कार्यक्रमांमध्ये त्यांची सहजता जाऊन आणि मूळ उद्देश बाजूला पडून औपचारिकता आलेली दिसते.

खरंतर असे कार्यक्रम म्हणजे सामाजिक जीवनातील एक सुंदर प्रसंग! यानिमित्ताने समाजाच्या विविध स्तरातील लोक एकत्र येत असतात. प्रत्येक जण नेहमी आपापल्या कामात व्यस्त असल्यामुळे इच्छा असूनही मित्रांच्या, नातेवाईकांच्या किंवा ओळखीच्या लोकांच्या भेटी होत नाहीत किंवा त्यांच्याकडे जाण्यासाठी वेळ मिळत नाही. परंतु अशा प्रकारचे कार्यक्रम आपल्याला आपल्या ओळखीच्या व्यक्तींना भेटण्याची संधी उपलब्ध करून देत असतात. त्यामुळे अशा व्यक्तींकडे जाण्यासाठी जो वेळ आपल्याला द्यावा लागला असता तो वेळ वाचतो आणि त्यांच्याशी अनौपचारिक गप्पागोष्टी करण्याची संधी अनायासे उपलब्ध होते. परंतु किती जण या प्रसंगाचा असा लाभ घेतात?

अशा कार्यक्रमात आपल्या ओळखीची व्यक्ती दिसली की आपण आपला हात उंचावून त्यांना अभिवादन करतो किंवा हाय हॅलो म्हणतो. चेहऱ्यावर एखादी स्मितरेषा असते. फार तर ” काय? कसे आहात? खूप दिवसांनी भेटला ” या पलीकडे संभाषणाची गाडी पुढे जात नाही. असा औपचारिक संवाद होऊन जो तो आपापल्या उद्योगात (म्हणजे येथे जेवण्याच्या किंवा शुभेच्छा देण्याच्या कार्यक्रमात) मग्न होऊन जातो.

अशा प्रसंगी समाजाच्या विविध स्तरातील लोक एकत्र आलेले असतात. परंतु आपण सर्वांशी संवाद साधत नाही. आपल्या ओळखीचे, आपल्या बरोबरीचे, आपल्या सामाजिक स्तराला शोभतील अशा प्रकारच्या व्यक्तींशीच आपण फार तर थोडे हितगुज करतो. या कार्यक्रमात असेही काही लोक आलेले असतात की ज्यांचा सामाजिक स्तर किंवा प्रतिष्ठा आपल्यापेक्षा कमी असते. अशा लोकांना आपल्याशी बोलावेसे वाटते परंतु अशावेळी आपली प्रतिष्ठा किंवा अहंकार आडवा येतो आणि आपण त्यांच्याशी बोलणे टाळतो काही लोक तर अशाप्रसंगी ओळखही दाखवत नाहीत. आयोजकांनी आवाहन केल्याप्रमाणे आपण खरोखरच कार्यक्रमाची फक्त शोभा वाढवण्यासाठी येतो आणि एखाद्या शोभेच्या वस्तूसारखेच येतो आणि जातो.

पण खरं तर असे कार्यक्रम म्हणजे लोकांशी संबंध दृढ करण्याची मोठी संधी असते असे मला वाटते. आजच्या काळात जसे आपण अनेक गोष्टींचे रिन्यूअल करतो तसेच संबंधांचे देखील रिन्यूअल करण्याची ही संधी असते. आपल्या मित्रमंडळींची, नातेवाईकांची आस्थेने विचारपूस करावी, त्यांची सुखदुःखे जाणून घ्यावी यासाठी हे कार्यक्रम अनायासे संधी उपलब्ध करून देतात. पण औपचारिकता, कृत्रिमता, अभिमान, अहंकार, खोट्या प्रतिष्ठेच्या कल्पना यासारख्या गोष्टींमुळे आपण अशा प्रकारची चांगली संधी अशा कार्यक्रमांमधून दवडतो.

पण अशाही प्रसंगात प्रेमाने विचारपूस करणारे, आस्थेने चौकशी करणारे काही लोक भेटतात. असे लोक मला वाळवंटातील हिरवळी सारखे वाटतात. त्यांच्याजवळ कृत्रिमता नसते. अभिमान किंवा अहंकार नसतो किंवा खोट्या प्रतिष्ठेच्या कल्पनाही नसतात. अशी माणसे प्रेमाचे किंवा शीतलतेचे गुलाबपाणी प्रत्येकाच्या अंगावर शिंपत असतात. अशी माझ्या ओळखीची काही माणसे आहेत. ती भेटली म्हणजे जवळ येऊन आवर्जून बोलणारच! कधी कधी त्यांच्या पिशवीत गुलाबपुष्पे किंवा चाफ्याची फुले असतात. आपल्या ओळखीच्या व्यक्तींना ही फुले देऊन आपुलकीच्या सुगंधाची देवाण-घेवाण करतात. काहीजण जवळ येऊन अकृत्रिम हस्तांदोलन करतात किंवा गळाभेट घेतात. यातूनही संबंध दृढ होतात अशा व्यक्तींबद्दलची आपुलकी, प्रेम वाढीस लागते. अशी माणसे संकटप्रसंगी धावून येतात, मदतीला नेहमीच तयार असतात. अशी माणसे म्हणजे समाजरूपी उपवनात फुललेली सुंदर फुलेच! वाळवंटात सगळीकडे वाळूच वाळू पसरलेली असते आणि रखरखीत वातावरण असते. अशा वातावरणात कुठे अपवादाने हिरवळ दिसली की मन प्रसन्न होते. अशीच ही माणसे वाळवंटातील हिरवळ!

© विश्वास देशपांडे

चाळीसगाव

प्रतिक्रियेसाठी ९४०३७४९९३२

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ स्मशानभूमि, ज्ञानभूमि… – भाग – २ ☆ श्री दिवाकर बुरसे ☆

श्री दिवाकर बुरसे

??

☆ स्मशानभूमि, ज्ञानभूमि… – भाग – २ ☆ श्री दिवाकर बुरसे ☆

(“आपल्या धर्मात एक फार चांगली रीत आहे. अग्निसंस्कार झाल्यावर, म्हणजे मृताचा मस्तकभंग झाल्याचा ध्वनी ऐकल्यावर जेव्हा आप्तेष्ठ स्मशानातून निघून जाऊ लागतात, तेव्हा तिथं स्मशानात जमलेल्या आप्तेष्ठांमधे जो वयानं सर्वात जेष्ठ असेल अशा व्यक्तीनं, अग्निसंस्कार करणाऱ्या व्यक्तीचं सर्वांसमक्ष अभिनंदन करावं. त्यानं केलेल्या या पुण्यकर्माचं कौतुक करावं म्हणजे इतरांनाही अशी सत्कर्मे करण्यासाठी प्रोत्साहन मिळतं. ते ही आपल्या जिवलगांविषयी आदरभाव, कृतज्ञता बाळगून अशी कर्मं करण्यास उद्युक्त होतात. त्यामुळे धार्मिक परंपरा आणि प्रथा पुढेही चालू रहातात.) 

इथून पुढे – – 

मला जवळ बोलावण्यामागे त्यांचा जो हेतू होता तो त्यांनी बोलून दाखविला. म्हणाले, “इथं जमलेल्या समाजात मीच वयानं जेष्ठ दिसतो. माझं वय आता सत्त्याऐंशी आहे. म्हणून मलाच हे कर्तव्य करायला हवे. तुमच्या भावाचं अभिनंदन करायला हवं. मी त्यांच्याशी, इतर लोकांशी बोलू शकतो का? ” मी म्हणालो, ” अहो भाग्यम्! निश्चित बोलू शकता. यामुळे सर्वांना बरंच वाटेल. चार ज्ञानाच्या गोष्टी समजतील. ” 

“ज्ञानाविषयी म्हणशील तर ज्ञानदानही सत्पात्री करावं. गुरूनं शिष्य नीट पारखून, त्याची योग्यता तपासून मगच त्याच्या योग्यतेप्रमाणे ज्ञान द्यावं. अशिष्याला ज्ञान देऊ नये. ‘अशिष्याय न देयम्’ असं शास्त्रवचनच आहे.

स्मशान हे ज्ञानदानासाठी सर्वात पवित्र स्थान आहे. स्मशानात अगदी एखाद्या चांडाळानं जरी ज्ञानयाचना केली तर गुरुनं त्याच्या अधिकाराचा, योग्यायोग्यतेचा कोणताही विचार न करता त्याला अवश्य ज्ञान द्यावं असंही शास्त्र सांगतं. इथं जमलेले तुम्ही तर सर्व ज्ञानाचे अधिकारी आहात. मी अवश्य बोलेन.

तुला व्यक्तिशः मात्र तत्वज्ञानाचं सार असणारा आचार्यांचा एक श्लोक सांगतो. जमेल तसं, वेळ मिळेल तेव्हा यावर चिंतन करीत रहा. कल्याणमस्तु! “

स्वामींनी स्मशानभूमीत मला सांगितलेला श्लोक आणि त्याचा अर्थ असा…

किं ज्योतिस्तव भानुमानहनि मे रात्रौ प्रदीपादिकं

स्यादेवं रविदीपदर्शनविधौ किं ज्योतिराख्याहि मे।

चक्षुस्तस्य निमीलनादिसमये किं धीर्धियो दर्शने

किं तत्रामहतो भवान्परमकं ज्योतिस्तद्स्मि प्रभो।।

स्पष्टीकरण:- 

‘किं ज्योतिः तव? ‘- कोणता प्रकाश तुझ्या उपयोगाला येतो? दिवसा सूर्याचा ‘रात्रौ प्रदीपादिकं’ – दिव्यामुळं. (दिवा नसल्यास चंद्र, अग्नी इ. मुळं) ‘स्यादेव’- असूदे! पण ‘रविदीपदर्शनविधौ किं ज्योति? ‘ सूर्य, दिवा इ. च्या ज्ञानाचं साधन कोणतं? ‘आख्याहि हे’ ते मला सांग. ‘चक्षुः’ (हो महाराज) डोळे. ‘तस्य निमीलनादिसमये किं? ‘ हे डोळे झाकल्यावर कशानं ज्ञान होतं? ‘धीः’ म्हणजे बुद्धीनं. ‘धीयो दर्शने किं? ‘ आणि बुद्धीचं ज्ञान कशानं होतं? ‘तत्राहम्’ – (हे बुद्धीचं ज्ञान व्हायला) मीच कारणीभूत आहे. आचार्य पुढे म्हणतात, ‘अतो भवान् परमकं ज्योतिः’ म्हणून या सर्वांना (सूर्य, चंद्र, दिवा, बुद्धी, डोळे) प्रकाश देणारा तूच आहेस. तूच परंज्योती स्वयंप्रकाश आत्मा आहेस!

स्वामींचा प्रत्येक शब्द मी लक्षपूर्वक ऐकत होतो. आमच्या या चर्चेत अर्धा पाऊण तास गेला असेल. तेवढ्यात जळणाऱ्या चितेतून ‘फट्’ असा ध्वनी उमटला. दोन-तीन निखारे ढासळले. काही ठिणग्या, सूक्ष्म धूम्ररेखा आणि अग्निशिखा बाहेर पडल्या. हे पाहून स्वामीजी बोलायचं थांबले आणि म्हणाले, “आता खऱ्या अर्थानं देहातील पंचही प्राणांचं उत्क्रमण झालं आहे. पार्थिवही पंचत्वात विलीन झालं आहे. आता इथंच थांबूया. येवढं पुरे. चला, लोक निघून जातील. त्यापूर्वी त्यांच्याशी बोलू. “

मी सर्वांना एकत्र जमवून, दोन मिनिटं मौन पाळून, समुदायिक श्रद्धांजलि अर्पण करायची विनंती केली. मौन झाल्यानंतर स्वामींनी पुढे येवून जमलेल्या सर्वांसमक्ष दादाचं अभिनंदन केलं, आभार मानले आणि समाजाला दोन तात्वज्ञानाच्या गोष्टी सांगितल्या.

ते म्हणाले, “सज्जनहो, हा मृत्युलोक आहे. इथं येणाऱ्या आपल्या प्रत्येकाला एक ना एक दिवस जावंच लागतं. जीवन क्षणभंगुर आहे हे स्मशानात आल्यावर कळतं आणि मनात वैराग्य उत्पन्न होतं. पण हे वैराग्य अल्पकाळ टिकणारं असतं. ‘मैथुन वैराग्य’, ‘प्रसूति वैराग्य’ आणि ‘स्मशान वैराग्य’ ही तिन्ही प्रकारची वैराग्यं अल्पजीवी असतात. ज्ञानप्राप्तीतून येणारं निर्भय वैराग्य चिरकाळ टिकतं आणि त्यातून माणूस अध्यात्माच्या वाटेवरून प्रवास करीत आपलं कल्याण साधतो. असो.

गेलेली व्यक्ती उत्तरायणात, महिन्याच्या शुक्लपक्षात, दिवसाच्या पूर्वार्धात गेल्यानं शास्त्रात सांगितल्या प्रमाणे ती निश्चितच प्रकाशमार्गानं उर्ध्वगतीला जाणार आहे. असा मृत्यु केवळ पुण्यवान माणसालाच प्राप्त होतो. शरीर नष्ट झालं तरी आत्मा अमर आहे हे आपण जाणता. तेव्हा शोक करू नये. त्यांचे आशीर्वाद तुम्हाला सदैव मिळत राहतील. ईश्वर सर्वांचे कल्याण करो. येवढं बोलून स्वामींनी आपलं अल्पसं पण प्रामाणिक, परिणामकारक प्रबोधनपर निवेदन संपविलं.

स्वामींचे आभार मानून, त्यांना वंदन करून मीही इतरांबरोबर स्मशानातून घरी जायला निघालो. नळावर जाऊन हातपाय धुतले आणि जाता जाता पुन्हा स्वमींकडे पाहिलं. स्वामी हात उंचाऊन सर्वांना निरोप देत तिथेच उभे होते. बाजूच्या काळोखात जळणारी चिता आणि तिच्या केशरी प्रकाशात कौपीनधारी स्वामींची मूर्ती उठून दिसत होती. त्यांचे तेजस्वी पण दयार्द्र डोळे विशेष चमकत होते!

काही दिवसात आमचे नित्याचे व्यवहार सुरू झाले. जो तो आपापल्या उद्योग व्यवसायात व्यस्त झाला. अशी काही वर्षं गेली.

१९८५-८६ (नक्की वर्ष आठवत नाही) च्या ऑगस्ट महिन्यात आम्ही कुटुंबियांनी चारधाम यात्रेला जायचं ठरवलं. प्रवासाचं नियोजन करताना कळलं की या यात्रेत उत्तरकाशी हे स्थान लागतं. मला एकदम मामाच्या अंत्यविधीच्या वेळी स्मशानात भेटलेल्या स्वामी चिद्विलासानंदभारतींची आठवण झाली. ते उत्तरकाशीहून पुण्यात आले होते त्यावेळी. म्हणजे ते इथल्याच कुठल्यातरी मठात, आश्रमात असणार असा तर्क करून मी या यात्रेत त्यांचं दर्शन घ्यायचं ठरवलं. त्यासाठी वेळ पडल्यास उत्तरकाशीत दोन दिवस वास्तव्य करायचं निश्चित केलं.

जेव्हा प्रत्यक्ष उत्तरकाशीत गेलो तेव्हा समजलं की इथं बरेच आश्रम आहेत. आपले स्वामीजी नक्की कुठल्या आश्रमात असतील हे कसं कळणार? त्यांच्या नावाखेरीज आपल्याला तर त्यांच्याविषयी अधिक काहीच माहित नाही. आपण त्यांना त्यांच्या नावाखेरीज अधिक काही विचारलंच नव्हतं. मग त्यांचा शोध घ्यावा कसा? कुणाला विचारावं? त्यांना कुठं शोधायचं? कसं शोधायचं?

मी ठरवलं आता प्रत्येक आश्रमात चौकशी करायची. कुठंतरी सापडतील की. निदान त्यांची काही तरी माहिती तर मिळेलच. हाँटेल मालकाच्या मदतीनं एका स्थानिकाला बरोबर घेऊन मी माझी ‘श्रीस्वामीशोधमोहीम’ सुरू केली.

दुसऱ्या दिवशी सकाळीच निघालो आणि एकेका आश्रमाला भेट द्यायला सुरवात केली. दिवसाचा पूर्वार्ध अगदीच वाया गेला. उपलब्ध माहिती इतकी त्रोटक होती की त्या माहितीवरून अनोळखी परगावात केवळ टोपण नावावरून एखादी व्यक्ती मिळणं जवळ जवळ अशक्य होतं. मी निराश झालो. ‘आता थांबावं, उगाच कालापव्य नको’ असं मनात येऊ लागलं तोच रस्त्यानं समोरून दोन तरूण जटाधारी साधक येताना दिसले. माझ्या आशा पुन्हा पल्लवित झाल्या.

मी त्यांना हाटकलं, अभिवादन केलं आणि विचारलं, “स्वामिजी, मी महाराष्ट्रातून आलोय. मला इथं कुठल्यातरी मठात राहणारे स्वामी चिद्विलासानंदभारती यांना भेटायचं आहे. मला त्यांच्या मठाचं नाव माहित नाही पण ते इथंच उत्तरकाशीत वास्तव्याला असतात. पुण्यात त्यांचा आणि माझा परिचय झाला होता. त्याला आता पाच वर्षं झाली. आपण मला काही मार्गदर्शन करू शकाल का? ” 

पुण्याचा उल्लेख ऐकल्यावर त्यातला एक जण जरा चमकला आणि चटकन म्हणाला, “आप हमारे आश्रम चलिये। हमारे गुरुजी शायद कुछ बता सकेंगे उनके बारेमे। चलिये हमारे साथ। आश्रम यही, नजदीकही है।” 

आम्ही त्यांच्या मागून आश्रमात गेलो. त्यांनी आम्हाला आपल्या गुरुजींसमोर उभं केलं. मी गुरुजींना वाकून नमस्कार केला. आशीर्वाद देत त्यांनी मला आसन ग्रहण करण्याची विनंती केली तसा मी जवळच्या दर्भासनावर बसलो.

गुरुजी मधुर वाणीनं म्हणाले, “कहियेजी, आप किसे ढूँड रहे है? आपको क्या चाहिये।” यावर मी त्यांना स्वामींविषयी माझ्याकडे होती तेवढी माहिती सांगून मला स्वामींच्या दर्शनाची तीव्र इच्छा असल्याचं सांगितलं. माझं सगळं म्हणणं शांतपणे, एकाग्रतेनं ऐकल्यावर गुरुजींनी एक दीर्घ उच्छ्वास सोडला केवळ, आणि गप्प बसले. मी आधीरतेनं म्हणालो, “क्या हुवा गुरुजी? मैने कुछ गलत तो नही कहाँ? ” त्यावर गुरुजींनी पुन्हा एक सुस्कारा सोडला आणि म्हणाले, “नहीजी, आप बिलकुल उचित स्थानपर आए है, परंतु आनेका समय अनुचित चुना आपने। स्वामी चिद्विलासानंदभारतीजी यही रहते थे।”

“रहते थे? अर्थात्? अब यहाँ नही रहते? कही बाहर गये है? वो अब कहाँ हो सकते है? आप हमे कुछ बता सकते है? ताकि हम वही जाकर उनका दर्शन करेंगे।” मी आधीरतेनं एका श्वासातच प्रश्नावर प्रश्न विचारले. गुरुजींनी आकाशाकडं पाहिलं आणि विषण्णपणे उद्गारले, “ओंम् शांति, शांति शांतिः। वत्स, स्वामिजी तीन वर्ष पूर्व, वृद्धावस्थाके कारण समाधिस्थ हो गये।मृत्युसमय उनकी आयू पूरे नब्बे वर्षकी थी। उनका अंतिम संस्कार यही नदीके तटपर किया गया और उपर समाधि स्थापित की गयी।” 

ही दुःखद वार्ता ऐकून मला फार वाईट वाटलं. मी तसाच व्यथित मनानं आसनावर बसून राहिलो. डोळे नकळत पाझरू लागले!

भावनावेग मंदावल्यावर मी स्वामींच्या समाधीचं दर्शन घेण्याची इच्छा व्यक्त केली. त्यावर गुरुजींनी जे सांगितलं ते ऐकून मी पुरेपूर हादरलो. गुरुजींनी सांगितलं की, “गेल्या वर्षी उत्तर काशीला भूकंप झाले, भूस्खलने झाली, नद्यांना महापूर आले. त्यात स्वामींजींची समाधी वाहून गेली. अक्षरशः ‘गंगार्पणमस्तु’ झाली. नदीचा आकार बदलला आणि काठचा भूगोलही बदलला. आता स्वामींच्या केवळ स्मृती विद्यमान आहेत! ‘

दहा मिनिटं कोणी काहीच बोललो नाही. नंतर मी उठलो. गुरुजींना वंदन केलं आणि आश्रमाबाहेर पडलो. दूर अंतरावरून संथपणे वाहणारी नदी दिसत होती. तिच्याकडे पाहताना मला वाल्मिकी रामायणातला श्लोक आठवला

यथा काष्ठंच काष्ठंच समेयाता महादधौ

समेत्यच व्यपेयातां तद्वत् भूतसमागमाः।l

दोन ओंडक्यांची होते सागरात भेट

एक लाट तोडी दोघा, पुन्हा नाहि गाठ।l

– समाप्त – 

© श्री दिवाकर बुरसे

पुणे

संपर्कः ९२८४३००१२५, ९५५२६२९२४५

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ मनामनातील वेताळ… लेख क्र. १० ☆ श्री संदीप सुंकले (दास चैतन्य) ☆

श्री संदीप सुंकले (दास चैतन्य) 

? मनमंजुषेतून ?

☆ मनामनातील वेताळ… लेख क्र. १० ☆ श्री संदीप सुंकले (दास चैतन्य) 

मनामनातील वेताळ ::: समारोप

विक्रम आणि वेताळाच्या गोष्टी आपल्यापैकी अनेक जणांनी ऐकल्या असतील, वाचल्या असतील…

त्या गोष्टीतील वेताळ जसा त्या विक्रम राजास त्रास द्यायचा तसा त्रास सध्या अनेक प्रकारचे अनेक वेताळ अनेक प्रकारांनी आपल्याला त्रास देत आहेत… , छळत आहेत, नव्हे छळकपट करीत आहेत, असे आपल्या लक्षात येईल.

श्रीरामरक्षेमध्ये एक श्लोक आहे…

*”पातालभूतलव्योम चारिणश्छद्मचारिणः । न द्रष्टुमपि शक्तास्ते रक्षितं रामनामभिः ॥ ११ ॥”*

अर्थ: पातालभूतलव्योम चारिणश्छद्मचारिणः – याची फोड पातालभूतलव्योमचारिण: + छद्मचारिणः अशी आहे. पातालभूतलव्योमचारिण: – पाताळ, भूमी आणि आकाश या तिन्ही लोकांत संचार करणारे, छद्मचारिणः – कपटी, मायावी खोटे सोंग घेणारे (राक्षस)

रामनामाने रक्षिलेल्या लोकांकडे असे (पहिल्या ओळीत वर्णन केलेले) मायावी आणि कपटी राक्षस नजर वर उचलून पण पाहू शकत नाहीत.

या श्लोकाचा संदर्भ आपल्याला आज सुद्धा लागू होतो…

अनेक वेताळ आपले मायावी रूप घेऊन आपल्या मनावर अधिराज्य करीत आहेत. त्यातील मोजक्या वेताळांचे वर्णन करण्याचा प्रयत्न मी माझ्या काही लेखात केला आहे…

तरीही काही छद्मी वेताळ आपल्या मनात दडून बसलेले आहेत, त्यांचा उल्लेख जाताजाता करतो…

# अतिरेकी सर्वधर्मसमभाव

# सद्गुण विकृती

# अंधानुकरण

# कुपमंडुक वृत्ती

# मला काय त्याचे?

# चांगले आईबाप न होता लोकप्रिय पालक होण्याची चढाओढ

# विहीत स्वार्थ न पाहता वैयक्तिक स्वार्थाकडे धावण्याची वृत्ती

माझ्या अल्पमतीने हे वेताळ मांडण्याचा प्रयत्न मी केला. या वेताळांचा त्याग करण्याचा प्रयत्न आपण सर्वांनी करावा अशी माझी नम्र विनंती आहे…!

राजेश खन्ना यांच्या तोंडी आनंद चित्रपटात एक छान संवाद आहे. तो सांगण्याचा मोह मला आवरता येत नाही…

*”बाबूमोशाय, जिंदगी बड़ी होनी चाहिए, लंबी नहीं”*

आपल्याला जर खऱ्या अर्थाने जीवन जगायचे असेल तर मग वर उल्लेख केलेल्या आणि आपल्या मनात दडून बसलेल्या अनेक वेताळांचा आपल्याला त्याग करावा लागेल…

तसा प्रयत्न आपण खात्रीने कराल असा विश्वास वाटतो…

कोणतीही रेघ जर न खोडता छोटी करायची असेल तर त्या रेघेच्या बाजूला आणिक एक मोठी रेघ आखावी लागते…

ही रेघ विवेकाची असावी…

विवेक या शब्दाची व्याप्ती खूप विशाल आहे. आपण ती नीट समजून घ्यावी अशी प्रार्थना.

शुभेच्छा!!!

 

© श्री संदीप सुंकले (दासचैतन्य)

मो. 8380019676

 ≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ माझी मायबोली माझा अभिमान!! ☆ डॉ. शैलजा करोडे ☆

डॉ. शैलजा करोडे

? मनमंजुषेतून ?

☆ माझी मायबोली माझा अभिमान!! ☆ डॉ. शैलजा करोडे ☆

लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी ।

जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी ।।

खरंच आपण सगळे भाग्यवान आहोत कारण मराठी आपली मातृभाषा आहे. मराठी ही भाषा खूपच गोड आणि सुंदर आहे. मराठी माणसाची खासियत अशी की तो हिन्दी संस्कृत या भाषा सहज आणि सोप्या रीतीने समजू बोलू शकतो. तसेच इंग्रजी बोलणे ही त्याला सोपे जाते कारण मराठी भाषा ही या भाषांमधूनच विकसित केली गेली आहे. मराठी भाषा ही महाराष्ट्राची मायबोली आहे. तसेच तिचे विभाजन ही तेथील प्रदेशानुसार केले गेले आहे. त्यात विदर्भाची भाषा, कोकणी, मालवणी अश्या मराठी पूरक भाषांचा समावेश आहे.

मराठी भाषेचा इतिहास खूप जुना आहे. ज्ञानेशाची ज्ञानेश्वरी, तुकारामाची गाथा, एकनाथांचे भारूड व अनेक संत कवींच्या रचना, अभंग यांनी ती परिपूर्ण तर आहेच शिवाय ती मराठी मनाचा हळवा कोपरा आहे. मराठी मनाची शान आहे.

उद्योग, व्यवसाय, संगणक या बदललेल्या युगातही मराठी कोठेही कमी पडत नाही म्हणजेच ती पोट भरण्याचेही साधन आहे.

आज मराठी ज्या रूपात जिवंत आहे ती फक्त छत्रपती शिवाजी महाराजांमुळे, त्यांच्या काळात मराठीला खरे महत्व प्राप्त झाले. शासकीय कामकाज आणि बोली भाषा म्हणून मराठीचा विस्तार झाला. मराठी भाषेवरील पर्शिअन भाषेचा प्रभाव या काळातच कमी झाला. जसा जसा मराठी साम्राज्याचा विस्तार झाला तसा मराठीचा ही विस्तार झाला. या काळात मराठी ही मोडी लिपीत लिहली जात असे.

बराच वर्षांपासून इंग्रजीमाध्यमातून शिक्षण प्रणाली आल्यापासून मराठी माध्यमातील शिक्षणाला महत्व देणे कमी झालेले दिसत आहे. मराठी भाषेतील साहित्य कविता, नाटके, प्रवास वर्णने, निबंध, लघुनिबंध ह्यांचा दर्जा बघितला तर अतिशय गर्व वाटतो. मराठी साहित्यातील साहित्यकारांनी आपल्यासाठी अतिशय मोलाचा ठेवा ठेवलेला आहे ते आपण मुलांना वाचण्यास प्रवृत्त करायला हवे.

मराठी ही एक प्राचीन आणि सुंदर भाषा आहे, तिला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला आहे. बदलत्या काळात इंग्रजी सुद्धा शिकली पाहिजे, हिंदी सुद्धा बोलावी लागते पण जो गोडवा मराठीत आहे तो कशातच नाही. आपण वेळेनुसार बदलले पाहिजे पण याचा अर्थ असा नाही की आपण आपले मूळ, आपली भाषा, मराठी संस्कृती विसरली पाहिजे. यासोबत आपण हे पण लक्षात ठेवले पाहिजे कि आदर, प्रेम हे परस्पर असते, म्हणजे दोन्ही बाजूंनी ते असावे लागते. जर आपल्याला भारतात, जगात मराठीला आदर आणि प्रेम मिळवून द्यायचे असेल तर आपल्याला दुसऱ्या भाषेंचा सुद्धा आदर केला पाहिजे.

जय मराठी!

जय महाराष्ट्र!

जय भारत!

 

© डॉ. शैलजा करोडे

नेरुळ नवी मुंबई मो. 9764808391

ईमेल – karodeshailaja@gmail.com 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ स्मशानभूमि, ज्ञानभूमि… – भाग – १ ☆ श्री दिवाकर बुरसे ☆

श्री दिवाकर बुरसे

??

☆ स्मशानभूमि, ज्ञानभूमि… – भाग – १ ☆ श्री दिवाकर बुरसे ☆

माझी आई सरदार बोकिलांकडची. पेशवाईतल्या साडेतीन शहाण्यांमधला एक पूर्ण शहाणा सखारामपंत बोकिल, यांची ही वंशज. वडिल बळवंतराव व आई गीताबाई यांचं माझी आई हे शेवटचं अपत्य म्हणजे शेंडेफळ. तिला एक मोठा भाऊ आणि दोन मोठ्या बहिणी. भावाचं नाव अण्णाजी. माझा मामा अण्णाजी बळवंत बोकिल उतारवयात आपला जेष्ठ मुलगा बळवंत (आजोबांचं नाव काही विशिष्ठ हेतूनं पुन्हा नातवाला ठेण्याची त्यावेळी पद्धत होती. त्यामागे काही श्रद्धा असाव्यात.) याच्याकडे रहात असे. हिवरे, चांबळी, घोरपडी इथल्या काही जमिनी विकून त्यांनी पर्वती पायथ्याला एक बंगला घेतला होता, तो आजही आहे.

१९८० च्या मे महिन्यात माझा मामा गेला. ही दुःखद वार्ता कळताच त्वरित मी, माझी आई रिक्षा करून मामाच्या घरी पोहोचलो. आईला पाहताच मामीनं, ” वन्सं, हे काय झालं हो ” म्हणून हंबरडा फोडून आईला गळामिठी मारली. दोघीही ढसाढसा रडल्या. भावनांना आवेग ओसरला आणि मग काय झालं, कसं झालं वगैरे माहितीची देवाण-घेवाण झाली.

थोडयाच वेळात इतर आप्तेष्ट, नातेवाईक, परिचित, शेजारी जमू लागले. जागोजाग, घरात, बाहेर लोक उभे होते. स्त्रिया आतल्या खोलीत मामी, वहिनी यांच्या भोवती होत्या. अनुभवी जाणकारांनी पुढची कार्यवाहीची सूत्रं हाती घेतली. मला आणि काही लोकांना वैकुंठात जाऊन तिथल्या पुढच्या व्यवस्था बघण्याचं दायित्व दिलं गेलं. सूचनेप्रमाणे आम्ही स्मशानभूमीवर गेलो.

गेल्या गेल्या मी पहिलं काम केलं मोघे गुरुजींना कळवण्याचं. त्यानंतर विद्युत दाहिनीची व्यवस्था. पण ती नेमकी बंद होती. त्यामुळे पारंपारिक पद्धतीनं अग्निसंस्कार करणं भाग होतं. मग इंधन, सरपण, लाकडं, गवऱ्यांची व्यवस्था करणं आलं. मृतव्यक्ति कोण आहे, पुरुष का स्त्री, तरुण का वृद्ध का बाल त्यावर किती इंधन लागेल हे ठरतं हे तिथं कळलं. वखावाल्यानं आवश्यक तेवढं इंधन हातगाडीवर भरलं. सोबत एक सहाय्यकही दिला गाडीबरोबर. मी स्मशानातला, त्यातल्यात्यात स्वच्छ असा एक चर निवडला. तिथं लाकडं उतरून घेतली. माझी धावपळ चालू होती.

सहाय्यकानं सरण रचायला घेतली. सरण रचण हे ही एक तंत्रकौशल्य आहे. त्यानं सर्वात खाली लाकडी ओंडक्यांचा एक थर दिला. त्यावर आडव्या उभ्या लाकडांनी चारी बाजू भक्कम केल्या. वर दुसरा थर देऊन तो थांबला.

तोपर्यंत सूर्यास्तही झाला. अंधार पडू लागला. स्मशानातले पिवळे सोडियम व्हेपरचे दिवे लागले. दिवसा आकाशात विहरणारे पक्षी चिवचिवाट करीत, झाडाझाडात दडलेल्या आपापल्या घरट्यात परतले आणि त्याच झाडाझाडातून वाघळांचे थवे किचकिचाट करीत बाहेर झेपावू लागले.

परस्पर स्मशानात येणारे आप्तेष्ट एकेक करून जमू लागले. पंधरा-वीस मिनिटात शववाहिनी पोहोचली. तिच्या बरोबर दोन चाकी चारचाकीतून आलेले स्नेही, सोबती, नातेवाईक आले. सर्वांनी श्रीरामनामाच्या घोषात मामाचं पार्थिव गाडीतून बाहेर काढून सरणाच्या बाजूला ठेवलं.

धार्मिक विधीसाठी लागणारं साहित्य मांडलं गेलं. पाच मिनिटात मोघे गुरुजीही आले. सरण अर्ध्यापर्यंत रचून झालं होतं. आमचा दादा (मामेभाऊ) वस्त्रं बदलून पुढल्या विधीसाठी सज्ज झाला. गुरुजींनी मत्रोच्चारास आरंभ केला. बाजूला ठेवलेल्या पत्रावळीवरच्या सातूच्या पिठाकडे बोट दाखवून ” कोणीतरी या पिठाचे पाच सारख्या आकाराचे पिंड वळायला घ्या बरं”. गुरुजींनी सभोवती उभ्या राहिलेल्यांकडे बघून आज्ञा केली. मी पटकन पुढे होऊन ते कार्य करू लागलो. “आता बॉडी उचलून चितेवर ठेवा”. पुढची आज्ञा झाली. चार-सहा लोकांनी देह तिरडीवरून उचलून चितेवर ठेवला.

गुरुजींच्या सांगण्याप्रमाणे मी केलेले पाच पिंड दादा नं मामाच्या देहावर ठेवले. त्यानंतर इतरांनी सहाय्यकाच्या मदतीनं उरलेली लाकडं, गावऱ्या रचल्या. एकानं शिंकाळ्यातलं मडकं उपडं करून त्यातला निखारा भूमीवर ओतला. गुरुजींनी प्रेताला अग्नी द्यायला सांगितला. गवरीची दोन खांडं हातात घेऊन, दादानं तो निखारा उचलून अश्रूभरल्या डोळ्यांनी चितेवर ठेवला आणि त्याला अनावर हुंदका आला. दोघांनी त्याला धरून जरा बाजूला नेलं. इतरांनी एकेक कोळंगा चितेवर ठेवला.

भावनांचा ओघ ओसरल्यावर दादानं जलानं भरलेलं मडकं डाव्या खांद्यावर धरून चितेला तीन प्रदक्षिणा घातल्या. प्रत्येक प्रदक्षिणा घालताना कोणीतरी दगडानं (यालाच अष्मा म्हणतात). मडक्याला एकेक छिद्र पडलं. शेवटी चितेकडं पाठ करून त्यानं तो घट खांद्यावरून मागे सोडला. मोठ्ठा ‘फाट्’ असा ध्वनि उठून ‘घटस्फोट’ झाल्याचे जगजाहीर झाले! डाव्या हाताची पालथी मूठ ओठांवर आपटून बोंब मारली आणि तो मटकन खाली बसला!

अग्नी धुमसू लागला. आसमंतात धूरच धूर झाला. अजून ज्वाळा दिसत नव्हत्या. पाच मिनिटं वाट पाहून एकानं पश्चिमेच्या बाजूनं चितेवर बाटलीतलं घासलेट शिडकलं आणि एकदम लाल, भगव्या, पिवळ्या ज्वाळांचे लोळ वरती उसळले. सारी शेड त्या प्रकाशानं उजळली. भोवताली कोंडाळं करून उभ्या राहिलेल्या लोकांच्या चित्रविचित्र कृष्णछाया शेडच्या भिंतींवर, छतावर नाचू लागल्या.

मी जवळच उभा होतो. ज्वाळांचा प्रकाश आणि धग असह्य झाल्यामुळे मी डोळे मिटून पटकन थोडा मागे सरकलो आणि मान एका बाजूला वळवली. दोनेक क्षण गेले असतील. मी डोळे उघडले. सहज माझं लक्ष शेडच्या कोपऱ्याकडं गेलं. दिसलं की तिथं एक काळा कभिन्न, सहा फूट उंचीचा, सत्तरी पार केलेला, मुंडन केलेला, हातात दंड, अंगावर भगवं कौपीन, पायात खडावा, कपाळावर, दंडांवर भस्माचे आडवे तीन पट्टे लावलेला सन्याशी उभा आहे!

त्याच्या अंगावरची भगवी वस्त्रं चितेतून उठलेल्या केशरी, लाल, पिवळ्या रंगाच्या ज्वाळांच्या प्रकाशात अधिकच उठून दिसत होती. त्याचे टपोरे पाणीदार डोळे अधिकच चमकत होते. मी पटकन डोळे मिटून पुन्हा उघडले. मला काही भास तर होत नाहीये ना? मी चार-पाच वेळा डोळ्यांची उघडझाप करून पाहिलं. पण तो भास नव्हता, वास्तव होतं.

तो सन्याशी माझ्याकडेच पहात होता. जिथं तो उभा होता त्या कोपऱ्याकडे इतरांची पाठ होती. तिकडं कोणाचं लक्षही नव्हतं. मी त्याची दृष्टी टाळत दुसरीकडे पाहिलं. काही क्षणानंतर माझ्या मनाविरुद्ध माझी दृष्टी पुन्हा एकदा त्याच्याकडं गेली. तो अजूनही माझ्याकडेच एकटक पहात होता. आमची दृष्टभेट झाली. माझा घसा कोरडा पडतोय असं मला वाटलं. मी एक कोरडा आवंढा गिळला. तेवढ्यात त्यानं मला मान हलवून खुणेनं जवळ बोलावलं. मी जागचा हललो नाही पण माझ्या मणक्यातून एक लहर शिरशिरली. क्षणभर थांबून त्यानं आता हातानं जवळ येण्याचा संकेत करताच माझी पावलं त्याच्याकडं ओढली गेली.

मी त्या स्वामींच्या जवळ गेलो आणि वाकून नमस्कार करू लागताच ते थोडे मागे सरकत पुटपुटले, “please don’t touch my feet. It’s not required. May God bless you and your family. ” मी हात जोडून उभा राहिलो. माझे थरथरते हात त्यांनी पाहिले असावेत. ते म्हणाले, ” Don’t be affred young man, relax. I wish to congratulate you and your relatives. ” त्यांच्या त्या अश्वासक शब्दांनी मी काहीसा तणावमुक्त झालो. ” मी विचारलं, ” Why Sir, what is the reason? ” त्यावर ते म्हणाले, ” Because you deserve it. You are doing a great job. “

माझ्या लक्षात आलं की हे कोणी उच्च शिक्षित योगी, संन्यासी असावेत. त्यांच्या इंग्लिश शब्दोच्चारावरून हे ही ध्यानात आलं की ते अमराठी आहेत. बहुदा दक्षिण भारतीय असावेत. तरीही मी म्हणालो, “स्वामिजी मै क्या सेवा कर सकता हूँ आपकी? ” त्यावर जरा संकोचून ते उत्तरले, “I am sorry my boy, I don’t understand Hindi or Marathi. I can speak English, Sanskrit and almost all South Indian languages. Tamil is my mother toung. ” यावर मी इंग्लिशमधे पृच्छा केली, ” I am very sorry, what can I do for you sir? ” (पुढील संभाषण मराठीतच सांगणं बरं.)

“ज्या व्यक्तीची उत्तरक्रिया इथं चाललीय ती दिवंगत व्यक्ति कोण आहे? आणि जो इतक्या आपुलकीनं, भक्तिभावानं क्रियाकर्म करतोय तो कोण आहे? नक्कीच तो सुसंस्कृत परिवारातला असणार. गेला अर्धातास मी बघतोय, सगळे विधी यथासांग आणि शास्त्रवत होतायंत. हे मंत्रोच्चर करणारे, विधिक्रम सांगणारे पंडितजी सुद्धा सुशिक्षित आहेत. तुम्ही मंडळी उच्चकुलीन वाटता. महाराष्ट्रीय ऋग्वेदी ब्राह्मण आहात ना? संकल्प सोडताना त्या कर्म करणाऱ्या मुलानं पंडितजींना आपलं गोत्र, प्रवर सांगितलं त्यावरून मी ताडलं. बरोबर ना? ” स्वामींच्या निरीक्षणशक्तीनं मी थक्क झालो. त्यांचा अभ्यास जाणवला. त्यांचा तर्क योग्य असल्याचं मी त्यांना सांगताच त्यांच्या मुखावर समाधानाची छटा उमटली.

आमच्या संभाषणातून मला स्वामींविषयी काही त्रोटक माहिती मिळाली. त्यांचं सध्याचं (सन्यास ग्रहण केल्यानंतरचं) नाव ‘स्वामी चिद्विलासानंदभारती’. ते त्यांच्या कोणा परिचिताच्या अंत्यविधीसाठी उत्तर काशीहून पुण्यात आले होते. विलंब नको म्हणून मृत व्यक्तीच्या निवासस्थानी न जाता ते लोहगाव विमानतळावरून टँक्सीने परस्पर वैंकुठ स्मशानभूमीवर आले होते. त्यांची अपेक्षित मंडळी अजून आलेली नसल्यामुळे ते इथंच थांबले होते त्यांच्या प्रतीक्षेत, एका कोपऱ्यात उभे राहून आमचे विधि पहात होते.

स्वामींना मी माहिती दिली की, मृत व्यक्ती माझे मामा असून त्यांची उत्तरक्रिया करणारा मामांचा जेष्ठ पुत्र, माझा मामेभाऊ आहे. त्यावर स्वामी म्हणाले, “आपल्या धर्मात एक फार चांगली रीत आहे. अग्निसंस्कार झाल्यावर, म्हणजे मृताचा मस्तकभंग झाल्याचा ध्वनी ऐकल्यावर जेव्हा आप्तेष्ठ स्मशानातून निघून जाऊ लागतात, तेव्हा तिथं स्मशानात जमलेल्या आप्तेष्ठांमधे जो वयानं सर्वात जेष्ठ असेल अशा व्यक्तीनं, अग्निसंस्कार करणाऱ्या व्यक्तीचं सर्वांसमक्ष अभिनंदन करावं. त्यानं केलेल्या या पुण्यकर्माचं कौतुक करावं म्हणजे इतरांनाही अशी सत्कर्मे करण्यासाठी प्रोत्साहन मिळतं. ते ही आपल्या जिवलगांविषयी आदरभाव, कृतज्ञता बाळगून अशी कर्मं करण्यास उद्युक्त होतात. त्यामुळे धार्मिक परंपरा आणि प्रथा पुढेही चालू रहातात.

– क्रमशः भाग पहिला 

© श्री दिवाकर बुरसे

पुणे

संपर्कः ९२८४३००१२५, ९५५२६२९२४५

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares