मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ भांड्याला भांडं लागणारच! ☆ सौ. ज्योती कुळकर्णी ☆

सौ. ज्योती कुळकर्णी 

? मनमंजुषेतून ?

☆ भांड्याला भांडं लागणारच! ☆ सौ. ज्योती कुळकर्णी ☆

भांड्याला भांडं लागणारच! 

आणि… 

लागले की नाद होणारच! 

याचा सरळ अर्थ खरं म्हणजे असाच आहे, की तोंडाला तोंड लागलं म्हणजे वाद होणारच! पण हे सरळ कुणाला सांगितलं तर आणखी कितीही तोंडं तोंडाला लागू शकतील आणि किती वाद वाढतील याचा नेम नाही. म्हणून आपण म्हणतो भांड्याला भांडं लागलं की नाद होणारच! तसेही आपल्याला मधून नादमय बोलायची सवय असतेच नं! म्हणूनही आपण तसं म्हणतो.

आमच्या माहेरी मंजुळ नादा मध्ये बोलायची कोणाला सवय नव्हतीच! घर एवढं मोठं की अशा मंजुळ नादात बोललं तर कोणाला हाकाही ऐकू येणार नाहीत आणि दिलेलं उत्तरही ऐकू येणार नाही. खाली-वर आम्ही आणि काका असं राहत असू. काही निरोप द्यायचा असेल तर शंखनादासारखा आवाज करून बोलल्याशिवाय जागच्या जागून निरोप कसा देणार! थोडक्यात शंकराच्या डमरूमधून काय निघेल! अशा नादाची आम्हाला अतिशय सवय होती. कोणी हळू बोललं तर जेवलीस की नाही? अशी विचारणा व्हायची.

त्यातून आमच्या घरातही दुकानं आणि घरासमोरही दुकान ओळी. मग काय! माझे वडील प्रेस वाल्यालाही पापाराऽऽम कपडे घेऊन जा. असे मोठ्ठ्या आवाजात सांगायचे. दुसऱ्या दुकानदाराला, दाढीचं ब्लेडही खर्जाच्या आवाजात मागूनच बोलावून घ्यायचे. अशी भांड्याच्या नादापेक्षा तोंडाच्या नादाचीच आम्हाला फार सवय होती. त्यामुळे नादमय भांडे काय असतात हे माहितीच नाही. एकदा आमच्या घरात भाड्याने राहणारी कुमुद नावाची बहिणी सारखीच एक मुलगी आली घरी. माझ्या हाताने दोन भांड्यांना भांडे लागले. आवाज झालाच! ती अगदी त्रासिक चेहरा करून म्हणाली, ‘ए तो नाद थांबव. ‘ मी तिला ठामपणे म्हटले, ”असा काय भांड्यांचा झालेला नाद थांबवता थोडाच येतो! ” मग तिने मला सांगितले की त्या भांड्याला हात लाव म्हणजे नाद थांबतो. तेव्हा मला कळले, खऱ्या भांड्याला भांडे लागणे आणि लागल्यावर नाद होणे म्हणजे काय असते ते.

असेच आमच्या बहिणींचे तोंडाला तोंडं लागणे की भांड्याला भांडे लागणे असे वाद आणि नाद नेहमीच व्हायचे कधी रडा रड व्हायची तर कधी आम्ही त्याची मजा पण घ्यायचो. एकदा आम्ही सर्वांनी घरी आणलेली केळी खाल्लीत. पण माझ्या लहान बहिणीने एक केळ जास्त घेतले. तर मी लगेच तिच्याशी भांडायला लागले एक केळ जास्त का घेतलं म्हणून! तेवढ्यात वडील आले. आणि मला म्हणाले घेऊ दे घेतलं तर ती का तुझ्या बापाचं खाते. मी मनातच म्हटलं ‘माझ्या बापाचं नाही तर कोणाचं खाते आहे? मी आधी आली आहे नं! ‘ पण तेवढं काही म्हटलं नाही बरं मी. तेवढं सौजन्य होतं म्हटलं माझ्यात! पण तरी अकलेचे तारे तोडलेच मी! माझे वडील जमदग्नीचा अवतार असूनही धाडस करून त्यांना म्हटलंच. ती माझ्यापेक्षा लहान आहे म्हणजे माझ्यापेक्षा जास्त काळ जगणार आहे. म्हणून ती माझ्यापेक्षा भरपूर जास्त केळं जास्त खाईल. यावर त्यांना अक्षरशः हसावे, की रडावे, की आपल्या या दिव्य पोरीवर पंचारती ओवाळून टाकाव्यात असेच झाले असावे. मी मात्र बोलून टाकूनही स्थितप्रज्ञ वृत्तीने त्यांच्याकडे बघत होते. शेवटी त्यांनीच माझा नाद सोडला.

असे नाद नेहमीच काही भांड्याला भांडे किंवा तोंडाला तोंड लागूनच होतात असे नाही. तर कधी कधी एकाचेच तोंड वाजत राहते. आमच्या आजीने माझ्या आईला कामात थोडा आधार व्हावा म्हणून माहेरची एक बाई कामासाठी पाठवली होती. त्यांना आम्ही सगळे नानीबाई म्हणत असूं. तेव्हा अशा बऱ्याच विधवा आणि सोवळ्या बायका असायच्या. कामही करायच्या बिचाऱ्या. त्यांच्या काही अपेक्षाही नसायच्या फारशा. त्या एक दिवस मला कॉफी द्यायला विसरल्या. त्या गेल्या नंतर किती वेळा कॉफी प्यायले पण कॉफी पिताना नेहमी आईला म्हणायचे की नानीबाईच्या वेळची माझी कॉफी शिल्लकच राहिलेली आहे. एक दिवस तिने दोन कप कॉफी दिली मला आणि सांगितलं ही नानीबाईच्या वेळी ची कॉफी घे आणि ही आताची कॉफी घे आणि तुझा एका भांड्याने-तोंडाने वाजणारा नाद संपव एकदाचा! तरी हळूच पुटपुटलेच मी! एकाच वेळेला दोन कप कॉफी घेऊन मागची थोडीच भरून निघते. पण आईला आपली लेक माहिती असल्यामुळे कळलं की हिच्याकडे आता जास्त लक्ष देण्यात अर्थ नाही!

असो. असा एका तोंडाने होणारा वाद एकदा मी सासूबाईं सोबतही केला. त्या दर गुरुवारी सगळ्यांना उपास असतो म्हणून भाजी संध्याकाळी आणायच्या. सकाळी माणसांमधून जेवायला हे एकटेच म्हणून त्या सकाळी काही भाजी आणायच्या नाहीत. माझ्या मनात असायचंच. ह्यांना त्या दिवशी दोनदा भाजी मिळेल म्हणूनच त्या आणत नाहीत. बरं सासरी आल्यावर तरी चुपचाप बसावं की नाही? एकदा मी म्हटलंच. हळूच पुटपुटले बरं. तरी त्यांना ऐकू गेलंच. ह्यांना गुरूवारी दोनदा भाजी मिळेल नं! म्हणून गुरुवारी सकाळी भाजी आणल्या जात नाही. त्या काही आई थोडीच होत्या! सरळ कमरेला पदर खोचून दोन भांडे समोरासमोर आले होते. पण जाऊ दे म्हणून मी माझं भांडं गप्पच ठेवलं त्यांचं वाजलेलं ऐकत राहिले.

असे भांड्याला भांडे किंवा तोंडाला तोंडे लागतांना कधी नाद होतो तर कधी वाद! अशा नादातूनच शंकराच्या डमरूतून निघाले तसे अ ई ऊ ण ऋ ऌ क निघाले तर सुंदर बोलण्याची भाषा आणि लिपी तयार होते नाही का? …

(ता. क. : अजून शिल्लक असलेले पुन्हा केव्हातरी…)

© सौ. ज्योती कुळकर्णी

अकोला

मोबा. नं. ९८२२१०९६२४

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ रेडिओ आणि मी… ☆ संगीता कुलकर्णी ☆

संगीता कुलकर्णी

? मनमंजुषेतून ?

☆ रेडिओ आणि मी ☆ संगीता कुलकर्णी ☆

(१३ फेब्रुवारी “जागतिक रेडिओ दिन” निमित्त.) 

मी सकाळी वर्तमानपत्र वाचत मोबाईल वर लावलेली गाणी ऐकत असताना ” ‘लग जा गले के फिर ये हंसी रात…’’ या सुमधुर गाण्याने माझे लक्ष वेधून घेतलं.. आज पुन्हा आठवलं नव्यानं…!

या निमित्ताने रेडिओच्या दिवसांतील माझ्य अनेक आठवणी मात्र जाग्या झाल्या… काही गोष्टी, आठवणी वस्तू अक्षरश: आपलं आयुष्य घडवतात. आणि अंशी आयुष्य बनूनच राहतात..!

रेडिओचे दिवस किती रम्य दिवस होते ते आणि त्या अविस्मरणीय आठवणी… आठवण एवढ्याचसाठी म्हटलं कारण माझ्या आयुष्यात त्याचं एक वेगळ स्थान होतं…! ती जुनी गाणी ऐकताच माझे मन नकळतच जुन्या आठवणीत रमून गेले.. आठवू लागले लहानपणीचे रम्यदिवस.. रेडिओच्या आठवणीचे..!

टीव्हीच्या आगमनापूर्वी रेडीओ या श्राव्य माध्यमाने माझ्यावर अधिराज्य केले किंबहुना तो माझा जीवन साथीच होता म्हणा ना..!

लहानपणापासून माझे व रेडिओ चे अतूट असं एक नात…!

सकाळी विविध भारतीच्या सिग्नेचर ट्यूनच्या आवाजाने जाग यायची.

सकाळची कामे उरकता उरकता ‘संगीत-सरिता’ कानावर पडायचं. हा शास्त्रीय-संगीतावर आधारित छान कार्यक्रम असायचा. एखादा राग निवडून त्याची वैशिष्ट्ये, त्याचे आरोह-अवरोह दिग्गजांच्या तोंडून ऐकायला मिळत. त्या दिवशीचे सन्माननीय अतिथी असलेले शास्त्रीय गायक, वादक त्या रागावर आधारित आपली पेशकश करत असत. त्या काळात या कार्यक्रमातून अनेक दिग्गज प्रभृती पेश झालेत हे विशेष. त्यानंतर त्या रागावर आधारित अशी एखादी धून किंवा चित्रपट गीत ऐकवलं जाई… रेडिओ सिलोन’ वरचा ‘पुराने फिल्मों के गीत’ हा कार्यक्रम…! “फौजी भाईयों की पसंद के फिल्मी गाने..! या कार्यक्रमासोबत मदमस्त गाण्यांचा सिलसिला…!

ऐकलेल्या गाण्यांचा कैफ मनावर ताजा असतानाच प्रादेशिक संगीत, हवामहल, चित्रलोक, भुले बिसरे गीत, भावसरगम, फिल्मसंगीत इ. अशा एकाहून एक सरस कार्यक्रमांची रेलचेल.. अभ्यासातल्या कविता चटकन पाठ होत नसत पण रेडिओवरच्या जाहिराती, जिंगल्स आजही लक्षात आहेत. ‘ये ढेर से कपडे मैं कैसे धोऊं…’, ‘रंग जमाता है कोकाकोला…’, ‘पापा पापा आए, हमारे लिए क्या लाए…’ ‘तंदुरुस्ती की रक्षा करता है …’ वगैरे वगैरे… रेडिओवरचा खास जिव्हाळ्याचा प्रोग्रॅम म्हणजे अमीन सायानीजी यांचा ‘बिनाका गीतमाला’… ‘ जीऽऽ हां… भाईयों और बहनो ” असं आपलेपणाने अँकरिंग करणारे अमीन सयानजी केक पायदान पेश करत.. बिनाका गीतमालाचा कार्यक्रम म्हणजे गाण्यांची मेजवानीच…! गाण्यांशी माझं भावविभोर विश्व निगडीत होतंच की..! मी कागद-पेन घेऊन ती यादी लिहून काढायची. वर्षभरातच्या आपल्या आवडत्या गाण्यांशी ती ताडून पाहायची.. रेडिओमुळे अनेक गीतांचे गीतकार, संगीतकार, गायक नीट लक्षात रहायचे.

विविधभारती वर गाणे लावण्यापूर्वी अगदी स्पष्ट आणि खणखणणीत आवाजात निवेदक वा निवेदिका सांगायचे.. “आईये, अब सुनते है, आशा भोसले और किशोर कुमार की आवाज में, शैलेंद्र का लिखा गीत, संगीत से सवांरा है एस डी बर्मनने और फिल्म का नाम है… ” किती छान वाटायचं हे ऐकताना..! इतकच काय तर क्रिकेट समालोचनात सर्वात आवडते म्हणजे सुरेश, सरय्या

किती मधाळ बोलणे अन ओघवती भाषा.!

अक्षरक्षः एका मागे एक अमॄतधारांचा वर्षावव..!!

रेडिओवर गाणी ऐकतच मी लहानाची मोठी झालेली.. इतकच काय रेडिओमुळे बर्‍याच जुन्या गाण्यांशी माझा दोस्ताना ही झाला होता… ती ‘भुली-बिसरदी यादें’, ‘बेला का फूल’! … विविध भारतीवरील अनेक कार्यक्रम (तेव्हाचे आणि आताचे). कॉलेजात असताना मी ‘साज और आवाज’ खूप आवडीने ऐकायचे. काही जाहिराती तर पाठ झाल्या होत्या. जशा की…

फिनोलिक्स नं आणलं पाणी…

प्रकाशचे माक्याचे आयुर्वेदिक तेल 

असे अजून बरेच काही आहे…

खरंच..! आठवणींचे मोहोळ उठलं..

या रेडिओच कलेच्या क्षेत्रात मोठं योगदान आहे. कित्येक कलाकार या रेडिओने घडवलेत. रेडिओवर नेहमी काही ना काही कार्यक्रम होत असत. त्यात नव्या कलाकारांना संधी मिळताच त्या संधीचं सोनं करीत असत. या कार्यक्रमाच्या अमृतमंथनातून अनेक रत्ने गवसलीत… ज्यांचे नाव उच्चारताच आजही माझे हात आदरानं कानाच्या पाळीकडे आपसूकच जातात..!

खरचं… रेडीओला पर्यायच नाही. मग युट्युब असो वा काहीही..! कारण किती तरी सुंदर निवेदने, अनेक सुंदर कार्यक्रम ऐकता येतात रेडिओ वरती… रेडिओ तो रेडिओच…! रेडिओला पर्यायच नाही…!

माझ्या आयुष्याचा अविभाज्य अंग बनलेला पण मध्ये विस्मरणात गेलेला हा रेडिओ,, आता, हवा का रुख देखकर, त्यानं आता नवं रुप धारण केलंय बरं…! . एफ. एम. रेडिओ..!! एफ. एम. आले तेच वाजतगाजत. या एफ. एम. मुळे गाणी ऐकण्याच्या आवडीला पुन्हा खतपाणी मिळालंय. पुन्हा रेडिओ माझ्या जीवनाचा अविभाज्य अंग झाल्याचं पाहून मी मनोमन सुखावली..!

माझ्या आयुष्याचा अविभाज्य अंग बनलेला हा रेडिओ माझी व रेडीओची पुनर्भेट म्हटलं तर वावग ठरणार नाही..!

आज आपण टेक्नॉलॉजिमध्ये कितीही पुढे गेलो असलो आणि मनोरंजनाच्या साधनामध्ये वैविध्यता आणली तरी ‘रेडिओ’ या श्राव्य माध्यमाची जी जादू आणि विश्वासाहर्ता आहे ती आजही टिकून आहे. रेडिओ हे संवादाचे जुने माध्यम असले तरी, संवादाचे एक महत्त्वाचे माध्यम म्हणून आजही पाहीले जाते.

ज्या रेडिओने मला गाण्यांचे वेड लावले, जगातील घडामोडींचे अपडेट्स दिले.. या आणि अशा कितीतरी रेडिओच्या आठवणी मनात आजही घर करून उभ्या आहेत..

रेडिओची त्या सुवर्ण कामाची आठवण काढीत मी गुणगुणत राहिले

“दिल ढुंढता है, फिर वही, फुरसत के रात दिन, “..!!

©  संगीता कुलकर्णी 

लेखिका /कवयित्री

ठाणे मो. 9870451020

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ “आजारपणाची गंमतगोष्ट…” ☆ नीता चंद्रकांत कुलकर्णी ☆

नीता कुलकर्णी

? मनमंजुषेतून ?

☆ “आजारपणाची गंमतगोष्ट…” ☆ नीता चंद्रकांत कुलकर्णी

आमच्या लहानपणी साधं सरळ आयुष्य होतं. ब्रेकफास्ट म्हणजे फोभा, फोपो किंवा पोहे… अगदी क्वचित कधीतरी रविवारी वडील पाव आणायचे. मग त्या दिवशी आम्हा तिन्ही भावंडांना चहा मिळायचा.

 इतर वेळेस आई सांगायची, ” लहान मुलांनी चहा प्यायचा नसतो. “

 यावर का? कशाला? वगैरे प्रश्न आम्ही विचारत नव्हतो. कारण वडीलधारे सांगतात ते बरोबरच असणार ही खात्री होती.

जेवणात पोळी, भाजी, भात, वरण थोडीशी कोशिंबीर. सकाळचं राहिलेलंच रात्री खायचं. त्याच्या जोडीला मुगाची खिचडी नाहीतर डाळ फळ… पानात टाकायचं नाही आणि वाया घालवायचं नाही हा नियमच होता.

त्या काळी सगळेच जण असं साधं सात्विक अन्न खात असल्याने आजारपण कोणाला फारसे नसायचेच.. आणि झाले तर अगदी साधे आजार होत असत. लगेच त्यावर आजीचे घरगुती उपचार सुरू व्हायचे…

पोट दुखण… हा आजार मधून मधून व्हायचा. त्यावर कधी, काय, किती खाल्लंय याचा विचार करून आई आणि आजी कुठलं औषध द्यायचं ते अचूक ठरवायच्या.

कधी ग्लासभर लिंबाच सरबत आजी द्यायची. वर बजावून सांगायची, ” घटाघटा पिऊ नको. थोडं थोडं थांबून घे. “

आता लक्षात येतं.. साखर, मीठ, पाणी म्हणजे ते ओरल सलाईनच असायचं. रात्री थोडंसं दूध घातलेली साबुदाण्याची खीर द्यायची. त्याने दुसरे दिवशी पोट एकदम बरे व्हायचे.

दुसरा इलाज म्हणजे तिखट बाळांतशेपा चावून खायला सांगायची. ते नको म्हटलं की उकळून त्या पाण्यात साखर घालून द्यायची.

ओवा भाजून तो हातावर चोळून लहान मुलांच्या पोटाला चोळायची. त्यानी कुरकुरणारं बाळ शांत झोपायचे.

गरम दुधात तूप घालून द्यायची. त्यांनी पोट मऊ पडतं(म्हणजे काय होत कोण जाणे) असं ती सांगायची. त्या दोघी हे कुठून शिकल्या याच आम्हाला आश्चर्य वाटायचं.

खोबरेल तेल तर बहुऊपयोगी होते. कान दुखला की चार थेंब कानात, लहान मुलांचे पोट दुखलं की कोमट करून ते बेंबीत थोडं थोडं घालायचं. केस चांगले वाढण्यासाठी रविवारी अंघोळीच्या आधी केसांना भरपूर खोबरेल तेल लावायचं. नंतर एक तासाने शिकेकाईनी केस धुवायचे.

थंडीत तेल पायाला लावायचं… तेच आमचं स्क्रीन लोशन असायचं. आणि गंमत म्हणजे त्याचे कुठले साईड इफेक्ट कधी व्हायचे नाहीत.

घसा दुखत असला की लवंग भाजून पूड करायची ती मधात खलून त्याच चाटण करून द्यायची.

सुंठ पूड विकत मिळायची. पण ती महाग असायची. आजी घरीच खलबत्त्यात सुंठ कुटायची. गरम पाण्यात साखर, सुंठपुड घालून ती प्यायला द्यायची. गवती चहा पाण्यात घालून त्याच्यात अजून काही काही घालून त्याचे काढे आम्हाला प्यायला द्यायची.

एवढ्या तेवढ्याला डॉक्टरांकडे जायचं नाही हे ठरलेलं असायचं. ताप आला तर मात्र डॉक्टरांना दाखवायच.

जवळच सिंधूताई आपटे यांचा दवाखाना होता. त्यांच्याकडे गेलं की त्या आ करायला सांगून जीभ बघायच्या. श्वास आत बाहेर करायला सांगून छाती तपासायच्या. बसं ईतकच… लगेच त्यांच्याकडच्या तयार असलेल्या पांढऱ्या गोळ्यांच्या पुड्या द्यायच्या. सोबत औषधाची बाटली… त्यावर शंकरपाळ्याच्या आकाराचा पांढरा कागद डोस किती घ्यायचा याच्या खुणेसाठी चिटकवलेला असायचा. त्यातल लालसर गोड औषध आम्हाला फार आवडायचं. दोन दिवसात ताप गायबच व्हायचा.

खेळताना भावाचा पाय मुरगळला आणि सुजला होता. आईनी लगेच रक्तचंदनाची बाहुली सहाणे वर उगाळायला घेतली. त्याचा घट्ट लेप भावाच्या पायाला लावला. ” जसजसं वाळेल तसं आकसून सूज आपोआप कमी होईल. “ती म्हणाली आणि खरंच तीन-चार दिवस लेप लावल्यानंतर सूज उतरूनच गेली.

कधी पाय दुखायला लागला की आजी तिळाच तेल लावून चोळायला सांगायची. घसा दुखत असला की गरम हळद दूध ती देत असे.

“गरम तव्यावर फडक गरम करून त्याने छाती शेकली की कफ सुटतो आणि खोकला लगेच बरा होतो. “आजी हे इतकं ठामपणे सांगायची की आम्हाला ते ऐकूनच बरं वाटायला लागायचं.

पाळी आली की पोटात दुखतय म्हंटलं तर आई सांगायची,

“प्रत्येक बाईला त्या दिवसात दुखत असतं. बाईंनी तेवढं सहन करायला शिकायलाच पाहिजे. त्यासाठी औषध घ्यायचं नाही. पुढं बाळंतपणाच्या कळा सोसायला बाईच शरीर तयार होत असतं. ” आईच्या या वाक्याचा अर्थ पुढे फार उशिरा कळला.

सायकल शिकताना गुडघे फुटणार.. हे इतकं गृहीत धरलं होतं की त्याचं काहीच वाटायचं नाही. नुसतं पाण्याने धुऊनही गुडघे बरे व्हायचे.

वर आजी म्हणायची, ” पडो झडो माल वाढो”.

वडिलांची पाठ दुखायला लागली की ते भिंतीजवळ पालथे झोपत. मग मी भिंतीचा आधार घेऊन त्यांच्या पाठीवर ऊभ राहून इकडे तिकडे अस करत चेपुन देत असे. आता हा ऊपचार आठवला तरी गंमत वाटते.

सकाळी झालेला आजार आजीच औषध घेऊन संध्याकाळी एकदम बरा होऊन जायचा. शाळा बुडवली असेल तर आज बाईंनी काय शिकवलं ते विचारायला संध्याकाळी मैत्रिणीकडे पळायच. इतक सोप जगणं होत.

आत्ताही बरं वाटलं नाही की आई आजींची औषधचं आधी मी घेऊन बघते…

त्या औषधात माया, आपुलकी, प्रेम होतं. त्या औषधाने मला बरं वाटणार… ही श्रद्धा पण होती. शरीराला मनाची साथ असल्याने आजार बरे व्हायचे. आईच्या उबदार कुशीत झोपताना आईचा हात कपाळावरून फिरला की निम्म दुखणे तिथेच पळून जायचं…

किती गोड दिवस होते ते…

 म्हणूनच त्या आठवणी आज तुम्हाला वाचण्यासाठी पेटीतून बाहेर काढल्या…

©  नीता चंद्रकांत कुलकर्णी

मो 9763631255

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ “बोल्ले तो मराठी…” ☆ श्री कौस्तुभ केळकर नगरवाला ☆

श्री कौस्तुभ केळकर नगरवाला

? मनमंजुषेतून ?

☆ बोल्ले तो मराठी☆ श्री कौस्तुभ केळकर नगरवाला ☆

जसविंदर… ऊर्फ जस्सी.

आमच्या चांडाळ चौकडीतला एक कोन.

खरं तर तो आमच्या गँगमधे कसा?

कोणालाही आश्चर्य वाटेल.

आम्ही तिघे.

म्हणजे मी, लल्या आणि सम्या… कौस्तुभ, ललित आणि सम्यक.

अनुक्रमे सदाशिव, नारायण आणि शनिवार. पुणे 30.

झोपण्यापुरते घरी असायचो.

बाकी स. प. महाविद्यालय किंवा त्यामागे तिलक.

आम्ही तिघेही एम. ए. मराठी करतोय.

खरं सांगायचं तर खाज म्हणून.

मराठी साहित्यविश्वाला,

आमच्या असण्यानं आणि नसण्यानं,

काहीही फरक पडणार नाहीये…

तरीही.

मी सो काॅल्ड पटकथा लेखक आहे.

दोन चार वेळकाढू, रोजच्या साबुछाप मालिकांच्या काही भागांचं लेखन केलंय.

नवीन कामाची धडपड चालूय.

असली रिकामी धडपड,

शिकतोय या नावाखाली, सहज खपून जाते.

लल्या एका नामवंत वृत्तपत्रात ऊमेदवारी करतोय.

बी. जे. झालंय.

त्याला शब्दप्रचूर असं काहीसं, जडजड स्तंभलेखन करायचंय.

एरवी नाईटशिफ्ट करतो.

राहिला सम्यक.

तो ऊत्तम निवेदक होणारेय म्हणे.

एका रेडिओ चॅनलवर पार्ट टाईम आर जे आहे.

थोडक्यात आमच्यापैकी कोणीही, वेल सेटल्ड नाही.

रिकामं घरी बसण्यापेक्षा काॅलेजदर्शन बरं.

आमचा अभ्यास.

हा एक अभ्यासाचा विषय.

अभ्यास फारसा करत नसलो तरी, वाचायचो भरपूर.

अत्रे सभागृहातलं एकही पुस्तकांचं प्रदर्शन चुकवायचो नाही.

आप्पा बळवंतचे वारकरी.

वाचनाची भूक वाढत चाललेली.

भरपूर वाचायचो.

अगदी तहानभूक विसरून.

माज करावा अशी एकच चीज, आमच्याकडे होती.

आमची शुद्ध, साजूक पुणेरी मराठी भाषा.

काय तिचा तो दिमाख.

तो लहेजा.

ते पावित्र्य.

ते भाषिक सौंदर्य.

ते अनुनासिक ऊच्चारण.

आम्ही तिघं बोलत बसलो की,

तमाम जन, तयांचे कान आम्हास बहाल करीत.

एखाद्या नऊवारीतल्या सुवासिनीने,

ईकडच्या स्वारीला, ” आम्ही नाही जा “

असे लटके बोल ऐकवावेत.

आणिक तो नरोत्तम, आनंदाने बेहोश व्हावा. ,

तस्सं.

तस्स मराठी असायचं आमचं.

जाम माज होता आम्हाला, आमच्या शुद्धतेचा.

किंबहुना खरं मराठी भाषासौंदर्य,

हे फक्त पुणे 30 या टापूतच टिकून राहिले आहे,

याविषयी आमच्या मनात किंतू नव्हता.

‘ आनी, पानी, करायलास, करतूस, काय बे… ‘

हे सगळं ऐकलं की आमचा पारा चढायचा.

बाहेरची लोकं, पुण्यात फार वाढलीयेत आजकाल.

त्यामुळे ईथल्या मराठीचा, घडी घडी विनयभंग होतोय, असं वाटायचं.

असल्या परभाषीक मंडळींपासून, आम्ही चार हात लांब असायचो.

थोडक्यात आम्ही शिष्टवर्गात गणले जात होतो.

हे असं होतं.

एकदा शुद्ध पुणेरी मराठीची भूतबाधा झाली की साला…

क्षमा असावी.

मेहुणा म्हणायला हवं खरं तर.

जाऊ दे.

एक दिवस असाच तिलकवर चहा ढोसत होतो.

आणि जस्सी भेटला.

त्यानं स्वतःहूनच ओळख करून दिली.

‘मी जसविंदरसिंग पंजाबी.

एम. ए. मराठी करतोय.

पुढं पीऐच. डी. पण करणार आहे.

संतसाहित्यावर.

नामदेवांवर. ‘

आम्ही ऊडालो.

एक तर शुद्ध, स्पष्ट भाषा.

अस्सल पुणेरी.

चितळ्यांच्या साजूक तुपातल्या, जिलबीहूनही साजूक.

एकदम वाटलं,

सुबोध भावे पंजाबी पगडी घालून, आला की काय?

‘ तु इतका शुद्ध मराठी कसा बोलू शकतोस? ‘

मी ओठांचा चंबू करून विचारलं.

‘ अरे त्यात काय?

आमची पुण्यातली चौथी पिढी आहे ही.

चिमण्या गणपतीपाशी आमचं पेंटस्चं दुकान आहे.

गेली चाळीस वर्ष.

मी काय, आमच्या घरी सगळे, ईतकंच अस्सल मराठी बोलतात. ‘

माझं तोंड चिमणीएवढं.

जस्सी कधी आमच्या गँगमधे सामील झाला, कळलंच नाही.

खरं तर आमच्यात खरा अभ्यास तोच करायचा.

एकदम सिनसियर.

प्रत्येक अॅक्टिव्हीटीत सक्रीय सहभाग.

मराठी साहित्य मंडळ, वक्तृत्व स्पर्धा सगळीकडे.

हे सगळं करून दुकानही सांभाळायचा.

परचेज, डिलीव्हरी, आॅर्डर, टेंडर…

यापैकी कशासाठी तरी टूरही करायचा.

नगर, औरंगाबाद, जालना, बुलढाणा ते पार नागपूरपर्यंत.

सातारा, कोल्हापूर, रत्नागिरी, सावंतवाडी ते पार गोव्यापर्यंत.

महिन्यातून दहा दिवस तरी जस्सी टूरवर असायचा.

दिवाळीची सुट्टी लागली.

जस्सी नागपूरला जाणार होता.

लल्या म्हणाला, आपणही जाऊ.

सम्याही तयार झाला.

तेवढंच महाराष्ट्र दर्शन.

जस्सीला विचारलं.

“मजा येईल.

एकट्याला जाम कंटाळा येतो.

ईन्डिका असते माझ्याकडे.

ड्रायव्हरही असतो. “

आठ दिवसाचा प्रोग्रॅम ठरला.

प्रत्येक ठिकाणी जस्सीचे सप्लायर.

अगदी घरगुती संबंध.

त्याच्याबरोबर आमचंही स्वागत व्हायचं.

हटकून घरी जेवायला बोलवलं जायचं.

मनापासून आग्रह व्हायचा.

नगरपासून सुरवात.

औरंगाबाद, जालना, मेहकर, बुलढाणा, अमरावती, अकोला, नागपूर…

प्रत्येक ठिकाणी वेगळा मेनू.

अस्सल प्रादेशिक.

आमची माती, आमची माणसं.

आम्ही सगळे खुष.

आम्हाला जस्सीचं खूप कौतुक वाटलं.

इतक्या कमी वर्षात, खूप माणसं जोडली होती त्यानं.

नागपूरला पोचलो.

संत्रा बर्फी हादडली.

नागपुरी पोहा चाखला.

परत निघालो.

सहज विषय निघाला.

“जस्सी, तुला कसं जमतं हे सगळं? “

सम्यानं विचारलं.

जस्सीनं मोठ्ठा श्वास घेतला.

” खरं सांगू, मायमराठीमुळे.

पंजाबीईतकंच माझं मराठीवर, प्रेम आहे दोस्तांनो.

पण माझ्या मराठीला भिंती नाहीयेत तुमच्यासारख्या.

अरे दहा मैलावर भाषा बदलते.

नगरला मी नगरी बोलतो.

नागपुरला नागपूरी.

अकोल्याला जाऊन, काय बाप्पा म्हणतो.

सगळं शिकून घेतलंय मी.

भिंती आपोआप गळून पडतात.

माणसं जवळ येतात.

भाषा माणसं जवळ करणारी असावी.

लांब नेणारी नको.

शुद्धलेखनात नियम पाळायलाच हवेत.

पण बोलीभाषेचा अनादर नको.

तीही तितकीच जपायला हवी.

शुद्धतेच्या कसोट्या त्याला लावायला नकोत.

भले भाषेचा लहेजा वेगळा असेल, पोत वेगळा असेल..

पण शेवटी मराठीच आहे ती..

मुळामुठेच्या सीमा ओलांडा अन् बघा, काय बहार येते ती.

समोरच्यानं दोन शब्द ऊच्चारले की, गाव सांगू शकतो मी.

माझ्या धंद्याचं हेच गुपित आहे.

माणसं जोडायला तिथली बोली यायला हवी. “

आम्ही सुन्न.

ऊघडा डोळे.

बघा नीट.

ऊघडले.

सम्यानं त्याच्या रेडिओ चॅनलवर एक टाॅक शो ठेवला.

वेगवेगळ्या गावची, आता पुण्यात सेटल झालेली मंडळी बोलावली.

मराठीची वेगवेगळी रूपं ऐकवली.

बहारदार कार्यक्रम झाला.

पुणेरी मराठी माणसाळतेय, असं वाटायला लागलं

परवा असाच जस्सीच्या दुकानात बसलो होतो.

” काला रंग का दाखवून राहिला बे, मले पारवा हवे हाय ना ” समोरचा माणूस दुकानातल्या माणसाला सांगत होता.

माझी ट्यूब पेटली.

‘ तुम्ही जळगावचे का हो?

ऐकायला छान वाटते तुमची भाषा. ‘

तो ताजाताजा पुण्यात आलेला.

एकदम खुष झाला.

पिशवीतून केळ्याच्या वेफर्सचा पॅक काढला.

मला गिफ्ट केला.

तिखट वेफर्ससुद्धा..

गुलाबजामूनपेक्षा गोड लागले.

मायमराठी तुला सलाम!

 

©  श्री कौस्तुभ केळकर नगरवाला

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ दुनियेतील सारे रंग तिच्याचमुळे…” – (अनुवादित) हिन्दी कवी : अज्ञात ☆ प्रा.भारती जोगी ☆

प्रा.भारती जोगी

? मनमंजुषेतून ?

☆ “दुनियेतील सारे रंग तिच्याचमुळे…” – (अनुवादित) हिन्दी कवी : अज्ञात ☆ प्रा.भारती जोगी ☆

स्त्री नेच तर केली आहे ना तिच्या हातांनी, विविध रंगांची उधळण,

पहिल्यांदा फाल्गुनातच शिकली गुलाल उडवणं.

तिनं पहिल्यांदाच जेव्हा अंगण सजवलं रांगोळीने…

तेव्हाच बहुधा भकास, उदास धरती ला ; रंगांत रंगून जाणं,

आणि जगणं कळलं, आपलेसे केले ते रंग तिने.

 

 

तबकात गुलाल घेऊन निघते ना ती…

तेव्हा चेहरेच नाही रंगवत त्याने;

तर… नात्यांचा रंग पार उडालेल्या भिंती

रंगवून टाकते आपलेपणा च्या रंगात!!

 

 

प्रेमाच्या उबदार स्पर्शाची, लालिमा उमटते तिच्या गाली अन् मोहक हास्यात.

वसंताचं सोनसळी तेज आहे डोळ्यांत.

हरित स्वप्नांची शीतल छाया आहे तिच्या पदरात.

आणि मनाच्या गहिरेपणात आहे आकाशाची निळाई.

 

 

ती जेव्हा हळूच येऊन रंग लावते ना कुणाच्या गालाला… तर जणू म्हणते..

तुच तर आहेस ना रे… माझं ; आपलं माणूस! “

 

 

तिनंच तर उदास, एकाकी घरांचे सण-सोहळे बनविले, साजिरं केलं घरांना.

आपलं दु:ख लपवून, हसणं शिकवलं इतरांना.

 

 

घराच्या भिंती भले ही बनविल्या असतील पुरूषांनी…

पण… त्या भिंतींना घर बनवलं ते स्त्रीनेच!! घरातल्या चुलीच्या धगीत,

आपली स्वप्न वितळवून…

त्याच राखाडी रंगात परिवार रंगवला.

 

 

खरं सांगायचं ना तर…

स्त्री फक्त होळी नाही खेळत;तर…

आपलं सगळं जगणंच दुस-याच्या नावात रंगवून टाकते.

आणि येवढं करूनही काय येतं तिच्या वाट्याला??? … तर…

बस्स्… फिकुटलेला पांढरा रंग!!

कारण सत्य तर हेच आहे ना… की…

स्त्री ने सा-या जगात रंगांची उधळण केली, पखरण केली…

पण जगाने मात्र तिच्या जीवनातले सगळे रंग बळकावून तिला बेरंग केले…

(एका भावलेल्या आणि मनाला भिडलेल्या हिंदी कवितेचा स्वैर भावानुवाद)

हिन्दी कवी : अज्ञात 

अनुवादिका / कवयित्री : प्रा.भारती जोगी.

पुणे. 

 फोन नंबर..९४२३९४१०२४.

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ “फॅशनची हुडहुडी…” ☆ श्री सुधीर करंदीकर ☆

श्री सुधीर करंदीकर

? मनमंजुषेतून ?

☆ “फॅशनची हुडहुडी” ☆ श्री सुधीर करंदीकर

गेल्या आठवड्यात प्रभात रोडला बायकोच्या दातांचं दाखवायला डेंटिस्टकडे जात होतो. सकाळचे ९ – ९. ३० वाजले असतील. थंडीचा महिना असल्यामुळे, चांगलीच थंडी होती. स्कुटरवर जायचं, म्हणून आम्ही स्कार्फ – स्वेटर अशा तयारीनीच निघालो होतो. संध्या रस्त्यावर ट्रॅफिक इतका फास्ट असतो, की, बाजूनी कोण जातोय, समोर कोण जातोय, हे बघताच येत नाही. आणि बायको मागे बसलेली असेल, तर, काही बघण्यासारखं असलं, तरी ते बघता येत नाही, किंवा मी काहीच बघत नाही, असंच दाखवावं लागतं. लॉ कॉलेज रोड ला लाल सिग्नल लागल्यामुळे ट्रॅफिक स्लो झाला.

माझ्या समोर एक मोटर सायकल होती. मागच्या सीटवर दोन्हीकडे पाय टाकून, साधारण ४ – ५ वर्षाची छोटी मुलगी बसली होती, आणि थंडीमुळे ती चक्क कुडकुडत होती. गाडी चालवणारी व्यक्ती बहुदा तिचे वडील असावेत. त्यांनी व्यवस्थित कोट घातला होता. कारण बाईक आणि थंडी, म्हणजे कोट पाहिजेच. कोटाची उब घेण्याकरता मागे बसलेली छोटी मुलगी त्यांना बिलगून बसायचा प्रयन्त करत होती. पण वडीलांच्या पोटाचा घेर बऱ्यापैकी मोठा असल्यामुळे, तिला ते जमत नव्हते आणि त्यामुळे तिला उब घेता येत नव्हती. आपोआपच माझं लक्ष तिच्या कपड्यांकडे गेलं. बघितलं, तर तिच्या अंगात फॅशनेबल असा अगदी पातळ कापडाचा फ्रॉक होता. मध्यंतरी स्लीव्ह लेस ची फॅशन होती, आणि आता त्याच्या पुढची पायरी म्हणजे शोल्डरलेस ची फॅशन आहे. तसाच काहीसा शोल्डरलेस आणि नो बॅक चा तिचा फ्रॉक होता. थंडी असूनही पायात सलवार किंवा फुलपॅन्ट नव्हती, पाय उघडेच होते. पायात मात्र फ्रॉक ला मॅचिंग बूट आणि मोजे होते. साहजिकच नवल वाटलं, की, एवढ्या थंडीत असे कपडे का घातले असावेत! बिचारीला थंडीमुळे हुडहुडी भरली होती. एक उत्सुकता म्हणून, मी ही शंका मागे बसलेल्या बायकोला विचारली.

बायकोकडून स्टॅंडर्ड उत्तर आलं, “तिचे वडील आहेत ना बरोबर! तुम्ही समोर बघून आपली गाडी चालवा”.

कालचं आपण पेपरमध्ये वाचलं, अपघात टाळायचे असतील तर, “एका वेळेस एकच काम करा / गाडी चालवत असाल, तर इकडे तिकडे स्वैर पाहू नका / गाडी चालवत असाल, तर मोबाईल वर बोलू नका, आणि मोबाईलवर बोलत असाल, तर त्यावेळेस गाडी चालवू नका”.

आणि याउपर तुम्हाला बघायचच् असेल, तर इथे कोपऱ्या कोपऱ्या वर छोटी छोटी मंदिरे आहेत, ती बघा.

मी सवयीप्रमाणे “थँक यु” म्हणालो.

सिग्नल जवळ समोरची बाईक थांबली. मी पण बाजूलाच थांबलो. बाईकवर माणसाच्या समोर त्यांचा मुलगा बसला होता. तो मात्र कपड्यांमध्ये पूर्ण पॅक होता. फुल पॅन्ट, अंगात स्वेटर, डोक्यावर कॅप वगैरे. त्या माणसाला उपदेश करण्यात काहीच पॉईंट नव्हता. आणि, तसही म्हणतातच, की, सिनियर सिटीझन झाल्यानंतर कुणालाही उपदेश करू नये. एकतर उपदेश ऐकायला कुणाला वेळ नसतो, उपदेश ऐकण्याच्या कुणी मनस्थितीत नसतो, आणि तिसरं म्हणजे, देणाऱ्याचा उपदेश आऊटडेटेड पण असू शकतो. अगदीच राहवत नसेल, तर फक्त स्वतः ला उपदेश करावा, किंवा तो डायरीमध्ये लिहावा.

थियरी कितीही छान असली, तरी, “दिल है के मानता नही”, असे प्रत्येकाचेच होते. विचार केला, की, सेफ्टीबद्दल तरी त्यांना सांगायलाच पाहिजे. अनायसे त्यांची गाडी शेजारीच होती.

मी : दादा, मागे मुलीला नीट धरता येत नाही आहे, मधून मधून मागे लक्ष ठेवा.

त्यांनी हो – हो म्हणत मान माझ्याकडे वळवली. आणि लक्षात आलं, की, हा तर मित्राचा मुलगा! त्यानी पण मला ओळखलं आणि नमस्कार केला. माझ्यामधलं उपदेशाचं मशीन आपोआपच सुरु झालं.

मी : अरे, ती थंडीनी कुडकुडतेय. स्वेटर विसरला का आणायला? आणि पायात पण काही नाही.

मुलीचे वडील : काका, स्वेटर कसा विसरेन? बाबा पण मागे लागले होते, तिला स्वेटर घाल म्हणून. पण बायकांना पटलं पाहिजे ना! त्यांच्या फॅशन मध्ये स्वेटर बसत नाही. एका लग्नाला चाललोय. बायको पाहुण्यांबरोबर रिक्षानी येते आहे. लग्नात सगळे मुलीच्या ड्रेस चे कौतुक करतील, म्हणजेच बायकोच्या सिलेक्शन चं कौतुक होईल. ड्रेस कुठे घेतला? कधी घेतला? केवढ्याचा आहे? हीला खूपच गोड दिसतोय! तुझ्या साडीला अगदी मॅच होतोय, वगैरे, वगैरे.

खास लग्नाकरता कालच हा ड्रेस आणलाय. आणि तिथे बदलायला असेच अजून दोन ड्रेस बरोबर घेतले आहेत.

तेवढ्यात आसपासच्या गाड्या सुटायला लागल्या, त्यावरून समजले, की, लाल दिव्याची वेळ संपत आली आहे. ५ -६ सेकंद शिल्लक असले, तरी, लोक आजूबाजूचा अंदाज घेत, सुटतातच. आमचे अच्छा – बाय झाले. हिरवा दिवा लागला आणि आम्ही पण सुटलो. तो यंगस्टर च्या स्पीडनी निघाला आणि मी सिनियर सिटीझन च्या स्पीडनी निघालो.

 बायकोनी दिलेल्या सल्ल्याप्रमाणे, मी रस्त्याच्या कोपऱ्यावर कुठे देऊळ दिसते कां? ते बघायला लागलो. आणि सिग्नल क्रॉस केल्यावर, लगेचच डावीकडे छोटे मंदीर दिसले.

 मी स्कुटर साईडला थांबवून, दोन मिनिटात येतो, असे बायकोला सांगून, मंदिराजवळ गेलो.

देवासमोर हात जोडून, “धन्यवाद, थँक्यू” असं म्हणालो.

देवाचे डोळे थोडे किलकिले झाल्यासारखे वाटले, आणि ऐकू आलं, “कशाबद्दल”?

मी : वर्षाच्या १२ महिन्यांमध्ये, तू ४ महिने उन्हाळा तयार केला, त्याबद्दल. आयांच्या फॅशन पायी छोट्या मुलींना वर्षांमधले तेवढे ४ महिने तरी थंडीची हुडहुडी भरत नाही.

देवानी डोळे पुन्हा किलकिले केले आणि ऐकू आले, “वेलकम”.

देवासमोर मी पुन्हा हात जोडले, आणि निघालो.

पेपरमध्ये वाचल्याप्रमाणे, ‘एका वेळेस एकच काम / गाडी चालवत असाल तर, इकडे तिकडे स्वैर पाहू नका / गाडी चालवत असाल, तर मोबाईल वर बोलू नका, आणि मोबाईलवर बोलत असाल, तर त्यावेळेस गाडी चालवू नका’, या मंत्रांची मी मनामधे उजळणी केली, आणि आता हे तंतोतंत पळायचेच, असे मनात ठरवून, मी गाडी सुरु केली.

तसं म्हटलं, तर स्त्रियांमध्ये फॅशन ची क्रेझ आपल्याकडे फार पूर्वीपासून आहे. पण तेव्हा रंगसंगती, कलाकुसर यावर भर असायचा. नंतर पाश्चिमात्यांची फॅशन सिनेमावाल्यांनी नट – नट्यांमध्ये आणली. पण ती बऱ्यापैकी सिनेमागृहात सीमित असायची. टीव्ही चा जमाना आला, घराघरात टीव्ही पोहोचला. जाहिराती वाढल्या, शोज वाढले, आणि फॅशन मधे अंग प्रदर्शनाचं विषारी बी, बेमालूमपणे, कसं आणि कुणी पेरलं, हे समजलंच नाही. टीव्ही मधली अंगप्रदर्शनाची फॅशन आता घराघरात अवतरली. आता अंगप्रदर्शन म्हणजेच फॅशन, हेच समीकरण झाले आहे. सध्या स्त्री सुरक्षिततेचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे, त्यामध्ये या आधुनिक फॅशन चा पण मोठा वाटा असणारच!

ग्लॅमर च्या दुनियेत अंगप्रदर्शन किती पुढे न्यायचं, हे प्रोड्युसर ठरवणार / ग्लॅमर आणि पैसा दिसत असला, तरी आपण अंगप्रदर्शन कुठे थांबवायचं, हे मॉडेल्स ठरवणार / आपण अनुकरणाची “री” कुठपर्यंत ओढायची, आपण कुठे डोळे बंद करायचे, हे मात्र आपल्याला ठरवायचे आहे, म्हणजेच, हा ज्याचा – त्याचा प्रश्न आहे.

पण एक मात्र नक्की – फॅशन मुळे हुडहुडी ही भरतेच – भरते!!

आयांची फॅशन – छोट्या मुलींना हुडहुडी, युवतींची फॅशन – पुरुष जातीला हुडहुडी (साधू – संतांना पण हुडहुडी भरल्याचं आपण वाचतोच), आणि स्त्रियांची फॅशन – नवऱ्यांना हुडहुडी, असंच म्हणावं लागेल!

© श्री सुधीर करंदीकर

मो. 9225631100 – ईमेल – srkarandikar@gmail. com

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ “विमानतळ…” ☆ नीता चंद्रकांत कुलकर्णी ☆

नीता कुलकर्णी

? मनमंजुषेतून ?

☆ “विमानतळ…” ☆ नीता चंद्रकांत कुलकर्णी

आमच्या राष्ट्र सेविका समितिच्या शाखेत खेळल्या जाणाऱ्या एका खेळाचे नाव आहे… ” विमानतळ” 

वेगळं वाटलं ना? सांगते कसा खेळला जातो ते..

सर्वांनी गोल करून उभ राहायचं. चारी कोपऱ्यात मातीतच गोल आखायचा. त्यांना चेन्नई, दिल्ली, मुंबई, कलकत्ता अशी नावं द्यायची. सर्वांनी घोषणा देत पळायचं.

“संघटन मे शक्ती है

शक्ती को बढाना है

हिंदुस्तान हमारा है “

जी खेळ घेणार असेल तिनी पाठ करून उभ रहायचं. काही वेळाने तिने शिट्टी वाजवली की ज्या विमान तळाजवळ तुम्ही उभ्या असाल… तिथे जाऊन उभ राहायचं. त्या उभ्या राहिल्या की नंतर खेळ घेणारीनी एका विमान तळाचं नाव घ्यायचं.

तिथे उभ्या असलेल्या सगळ्या जणी खेळातून बाद… कितीही नाही म्हटलं तरी पहिल्या फेरीत बाद झाल्यावर वाईट वाटतं..

परत दुसरा राउंड… सर्वजणी आऊट होईपर्यंत असा खेळ चालु ठेवायचा.

खेळाचे मर्म लक्षात आलं का?

– – सगळ्याजणी पळत होत्या. पण नेमकं ज्या विमानतळाचं नाव उच्चारलं त्या खेळातून बाद झाल्या.

आयुष्यात असंच अनपेक्षित पणे काहीही होऊ शकतं… त्याचा स्वीकार करायचा. सारखं गुडी गुडी, चांगलंच होईल का? तर नाही.. जगत असतानाही असे अचानक धक्के बसत असतात. त्यावेळी नाऊमेद व्हायचं नाही. असही घडतं.. ते पचवायची, त्याच्याशी सामना करायची… तुमची मानसिक तयारी असायला हवी..

हेच या खेळातून शिकवलं गेलं आहे. खेळातून बाद झालो हे सहजपणे घेत… बाहेर उभं राहून खेळणाऱ्यांना घोषणा देत प्रोत्साहन द्यायचे.

हा खेळ झाला की परत पुढचा खेळ खेळायला सुरुवात करायची…

दुसरा खेळ आहे अग्निकुंड..

यात गोल करून.. एकमेकींचे हात घट्ट धरून उभं राहायचं. मध्यभागी प्रतिकात्मक अग्निकुंड आहे. जोर लाऊन शेजारचीला त्यात ढकलायच. जिचा पाय उचलला जाईल.. जी गोलाच्या आत ढकलली जाईल.. ती या खेळातून बाहेर.. शेवटी दोघी राहिल्या की त्यांनी एकमेकींना ओढायचे… शेवटी त्यातली एक जण जिंकणार…

समोर संकट दिसतंय… कुणीतरी तुम्हाला त्यात ढकलतय.. त्या क्षणी तुम्ही सर्व शक्तीनिशी त्याला प्रतिकार करायचा. पाय घट्ट रोवून उभं राहायचं. अगदी ठामपणे…

एखादा मुद्दाम तुम्हाला त्रास देत असेल तर प्रतिकार हा केलाच पाहिजे.

अर्थात हे कोणीतरी शिकवलं तर हे जमेल. यष्टि प्रशिक्षणातून हेच तर समितित शिकवलं जातं. निरनिराळे व्यायाम प्रकार, खो खो, कबड्डी या सारखे खेळ घेतले जातात. शरीराला एक प्रकारची शिस्त लावली गेल्यामुळे शरीर कणखर बनते.

सध्या सोफ्यावर बसून मोबाईलवर तासन्तास खेळ खेळले जातात. त्यात जिंकलो, पॉईंट मिळाले तर ते कृत्रिम, आभासी असतात. प्रत्यक्ष व्यवहारात त्याचा उपयोग शून्य आहे.

शाखेत मैदानावरच्या मातीत खेळत असताना जोम, उत्साह, तरतरी, आत्मबल हे मिळत असते. त्यासाठीच तुम्ही राष्ट्र सेविका समितिच्या शाखेत या…

त्यासाठी कुठलीही फी नाही.. परीक्षा नाही.. इथे प्रत्येकाच्या मनात राष्ट्रप्रेम जागवले जाते.

नवीन ओळखी होतात. एकमेकांमध्ये आत्मीय भाव, स्नेह निर्माण होतो. इतर कुठेही शिकवले जात नाही… ते इथे शिकायला मिळते. देशभक्तीपर गीतं शिकवली जातात.

ती सर्वांबरोबर जोरकसपणे म्हणताना मनात उत्साह व चैतन्य येते.

” पुण्य भू: मातृभू हिंदू भूमी आपुली

स्वर्गतुल्य भासते आम्हास माय माऊली”

अशा आपल्या मायभूमीचे रक्षण करण्याची जबाबदारी आपल्यावर आहे. त्यासाठी एक होऊया..

… आपण सध्याच्या जगात सजग.. सतर्क व्हायला हवे आहे.

… तर मग निश्चयाने उचला पाऊल…

©  नीता चंद्रकांत कुलकर्णी

मो 9763631255

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ “ती… स्वयंसिद्धा…” – (अनुवादित) हिन्दी कवयित्री : निधी सक्सेना ☆ प्रा.भारती जोगी ☆

प्रा.भारती जोगी

? मनमंजुषेतून ?

☆ “ती… स्वयंसिद्धा…” – (अनुवादित) हिन्दी कवयित्री : निधी सक्सेना ☆ प्रा.भारती जोगी ☆

दाखले नकाच मागू तुम्ही…

ती आहेच स्वयंसिद्धा.

पण, प्रेमात आकंठ बुडालेली असते ना…

तेव्हा स्वतः ला विसरूनच जाते जशी

आपणहूनच बांधून घेते, बंधनात स्वतः ला,

घालून घेते शृंखला पायी…

आपणहूनच अडकवून घेते प्रेमाच्या धाग्यात स्वतः ला…

स्वतः च, स्वतः शी केलेल्या संकल्पासारखी.

तुझ्या प्रेम अंबरात आपल्या इच्छा अगदी सफाईने टाचून ठेवते.

असीम अशी शक्ती दडपून ठेवते

वात्सल्याच्या उतरंडी खाली.

ऐक ना…

पण तू नको हं नजरेआड करूस

तिचं हे स्व समर्पण! 

घालायचंच असेल तर घाल बंधन…

पण… शब्दांत हवं तेवढं, हवं तेव्हा… व्यक्त होण्याचं.

स्वाभिमानाचं आभूषण दे तिला, ल्यायला तिच्या मनावर.

बांधून ठेव तिला तुझ्या प्रेमाच्या रेशमस्पर्शी बेडीत.

तिचा स्व कर की स्वतंत्र… होऊ दे तिला मोकळी.

मग बघ… उत्साहाची कर्णफुले घालून…

सावरीच्या कापसासारखी हलकी होऊन,

आनंद लहरींवर कशी तरंगेल, हर्षोल्लासाने नाचेल.

तुझ्या कितीतरी अशा गोष्टी…

ज्या तिच्या कल्पनेतल्या ; पण तू कधीच न केलेल्या अशा कितीतरी गोष्टीतही

सप्तसुरांचं मधुर संगीत ऐकल्याच्या काल्पनिक आनंदात थिरकलीयं ती…

पण आता मात्र तू एखादं खरंखुरं मधुर गीत बनून येशील… तरच ना सगळं जुळून येईल मनाजोगतं…

येशील कां रे?? … येशील ना???

(‘स्वयंसिद्धा स्त्री’ या निधी सक्सेना यांच्या हिंदी कवितेचा स्वैर भावानुवाद…)

अनुवादिका / कवयित्री : प्रा.भारती जोगी.

पुणे. 

 फोन नंबर..९४२३९४१०२४.

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ “तुम्हीच ठरवा – योग्य की अयोग्य??” ☆ श्री संभाजी बबन गायके ☆

श्री संभाजी बबन गायके

 

??

“तुम्हीच ठरवा – योग्य की अयोग्य?? ☆ श्री संभाजी बबन गायके 

तुम्हीच ठरवा – योग्य की अयोग्य??

स्वामी सामर्थ्यावर विश्वास नाही काय?

समाज जीवनास संतांचा मोठा आधार वाटतो. मी तुझ्या पाठीशी आहे, असं स्वामी समर्थ म्हणतात तेंव्हा भक्तास आपण सामर्थ्यशाली आहोत अशी भावना निर्माण होते आणि त्या आत्मविश्वासाने तो संसारातील समस्यांना सामोरा जातो.

स्वतः नामस्मरण करणं आणि तसं इतरांना करायला उद्युक्त करणं ही गोष्ट पुण्यप्रद आहे, हे खरेच आहे. पण… श्री स्वामी समर्थ असं facebook post वरील comment section मध्ये type कर… म्हणजे तुझ्या समस्या दूर होतील, तुला अमुक इतक्या तासांत, दिवसांत धनलाभ होईल असं सांगणं हे कितपत योग्य आहे?

 Comment मध्ये type केल्याने नामस्मरण होत असेलही पण धनलाभ मात्र page निर्मात्यास होत असावा! कारण अशी कित्येक pages दिसू लागली आहेत. येनकेन प्रकारे लोकांना comments करण्यास उद्युक्त करण्याचा प्रयत्न केला जातो. जाहिरातीमध्ये लोकांच्या मनातील विविध भावनांना हात घातला जातो. त्यात भीती, आमिष, स्वामित्व, अभिमान इत्यादी भावनांना आवाहन करून वस्तू खपवली जाते… उदाहरणार्थ हम… वाले हैं! सारखी जाहिरात! असो.

लिहा comment मध्ये स्वामी समर्थ इत्यादी इत्यादी मार्गाने स्वामींशी संबंधित संस्थांना पैसे मिळत असतील तर ते एकवेळ ठीक आहे. पण अधिकृत संस्था हा मार्ग अवलंबत असतील, असं वाटत नाही!

यातील काही pages वाल्यांचा हेतू निव्वळ स्वामी नामाचा प्रसार करणे असा शुद्ध असूही शकतो आणि त्याबद्दल त्यांचे कौतुक आहे!

पंढरपूर मधील एका प्रसिद्ध मठात रामनाम लिहिलेले कागद जमा करून घेतले जात. काही लोक घरी वहीत नाम लिहित असतात. देवाचे, संतांचे नाव मुखातून उच्चारले जाणे महत्वाचे आहे. मनातल्या मनात नामस्मरण सुद्धा – – 

संतोषी मातेची पत्रे पाठवा, बालाजी आणि अनेक स्थानिक देवतांच्या नागांची कथा असलेली hand bills छापून वितरीत करणे इत्यादी प्रकार अजूनही प्रौढ लोकांच्या लक्षात असतील.

स्वामी अशक्य ते शक्य करतात असा विश्वास असल्यास भक्तांना कुठेही ऑनलाईन जाण्याची गरज पडणार नाही… त्यापेक्षा स्वामींच्या मंदिरात त्यांच्या दर्शनाच्या लाईन मध्ये उभे राहून नामस्मरण करीत दर्शनाची प्रतीक्षा करणे केंव्हाही श्रेयस्कर आहे, असे वाटते. जय स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ!

© श्री संभाजी बबन गायके 

पुणे

9881298260

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ अहल्या… ☆ उज्ज्वला केळकर ☆

उज्ज्वला केळकर

??

☆ अहल्या…  ☆ उज्ज्वला केळकर

अहल्या – – 

अहल्येची नि माझी ओळख माझ्या नकळत्या वयात झाली. आमचं बालपण, तिन्हिसांजेला घरी आल्यावर हात-पाय धुऊन, वडीलधार्‍यांना नमस्कार करून, ’शुभं करोती’ आणि नंतर पाढे-परवचे म्हणण्यात सरलं. ते झालं की आजी वेगवेगळे श्लोक शिकवायची. म्हणून घ्यायची. त्यानंतर गोष्टीचा खुराक असे. या विविध प्रकारच्या श्लोकांमुळे, मनावर आणि वाणीवर उत्तम संस्कार होतात, असं तेव्हा मानलं जायचं. तिने शिकवलेल्या श्लोकांमध्ये एक श्लोक असा होता- 

‘अहल्या, द्रौपदी, सीता, तारा मांदोदरी तथा। पंचकन्या स्मरे नित्यं महापटक नाशनम्।।‘ अर्थ न समजता, त्यावेळी पाठांतर म्हणून पाठ केलेला हा श्लोक.

प्राथमिक शाळेत गेल्यावर देव-देवतांच्या, रामायण-महाभारतातल्या कथा वाचायला-ऐकायला मिळाल्या. त्यातच रामाच्या पदस्पर्शाने शिळा झालेल्या अहिल्येचा उद्धार झाला, ही कथाही ऐकली-वाचली. त्याच काळात रामदासांचे मनाचे श्लोक पाठ केलेले आठवतात. त्यातच एक श्लोक असा होता, ‘अहल्या शिळा राघवे मुक्त केली. पदी लागता दिव्य होओनी गेली. ‘

अर्थात असा अहिल्येला उद्धारणारा श्रीराम, ज्याचे गुणवर्णन करताना वेदवाणीही शिणून गेली, त्या रामाच्या गैरवासाठीच या श्लोकाची रचना रामदासांनी केली होती.

हायस्कूलमध्ये गेले आणि हे असं का? ते तसं का, हे जाणून घेण्याचं कुतुहल वाढलं. त्यावेळी एकदा आजीला म्हंटलं, ‘ तू तो पंचकन्या स्मरे नित्यं ’ श्लोक शिकवलास ना, म्हणजे बघ…. आधी कितीही पापं केली, तरी चालतील… या पंचकन्यांचं स्मरण केलं की झालं! मिळाली सगळ्या पापांपासून मुक्ती… ’

‘फाजीलपणा करू नकोस! तुम्हाला पापं करायला परवानगी दिलीय, असा नाही याचा अर्थ होत! ’ आजी रागारागानं म्हणाली.

‘पण काय ग आजी, या पंचकन्यांचं स्मरण का करायचं?

‘अग, त्या महान पतिव्रता होत्या. ’

‘ मग मला सांग आजी, अहल्या पतिव्रता होती ना? मग गौतम ऋषींनी तिला शिळा होण्याचा शाप का दिला? ’

‘भ्रष्ट झाली होती ना ती? ’

‘पण ती भ्रष्ट झाली यात तिची काय चूक होती? मग तिला का शाप? ’

‘तुम्हा हल्लीच्या मुलींना काही सांगायची सोय नाही. सांगायला गेलं की टांगायला नेता तुम्ही! ’ आजीचं हे उत्तर म्हणजे स्वत: माघार घेताना दुसर्‍यावर ठेवलेलं ठेपर असे. पण अहल्येचं पातिव्रत्य आणि तिचं शिळा होणं याची तर्कशुद्ध सांगड काही आजीला घालता यायची नाही.

अभ्यास वाढला आणि विज्ञानाचा पगडा मनावर बसला, तेव्हा माणसाचं शिळा होणं, बुद्धीनं नाकारलं. या कथेवरची चमत्काराची पुटं खरवडून, त्यावेळी नक्की काय घडलं असेल, याचा शोध, मन नकळत घेऊ लागलं.

अहल्येकडे गौतमाच्या वेशात इन्द्र आला आणि अहल्या फसली, असं पुराणकथा सांगते. पण मला वाटतं, तसं नसणार. कारण ती गौतमांच्या स्ंनन्संध्येची ती वेळ. आपला पाती कोणत्या वेळी कोणती मागणी करेल आणि कोणती अपेक्षा बाळगेल, हे पत्नी या नात्याने अहल्येला निशितच माहीत असणार. ’गणेश पुराण’सारख्या काही पुराणातून अहल्येने इंद्राला ओळखलं होतं, असंही म्हंटलं आहे पण अहल्येने स्वखुशीने इंद्राला जवळ केलं, असं मानलं, तर परंपरेने एक पतिव्रता स्त्री म्हणून अहल्येचं नाव आपल्यापर्यंत पोचवलं नसतं. काळाच्या विस्मृतीत ते केव्हाच लोप पावलं असतं.

इंद्र, इंद्र म्हणूनच अहल्येकडे गेला असेल. त्याला वाटलं असेल, आपल्या वैभवाने, नाव-कीर्तीने आपल्या सौंदर्याने-शौर्याने-सत्तेने अहल्या दिपून जाईल पण प्रत्यक्षात तसे घडले नसेल. अहल्येच्या सौंदर्याने मोहित झालेल्या इंद्राने तिच्यावर बलात्कार केला असेल. या आकस्मित आघाताने ती इतकी बधीर, चेतनाशून्य झाली असेल, की आपल्याबाबतीत काय घडलं, याची जाणीवच ती हरवून बसली असेल. एखाद्या दगडाप्रमाणे, ती आपल्या जाणीवा, वास्तवाचं-परिसराचं भान हरवून बसली असेल. अहल्या शिळा झाली असेल, ती या अर्थाने. एखादा कटू प्रसंग विसरण्यासाठी, तो घडल्याचच मन-बुद्धी नाकारते, असं मानसशास्त्र सांगतं. अहल्येच्या काळातील समाजाची मानसिकता लक्षात घेतली, तर तेव्हा पातिव्रत्य या मूल्याला सगळ्यात जास्त महत्व होतं. त्यामुळे व्यक्तीगत पातळीवर अहल्येने स्वत:चं अस्तित्व नाकारलं असेल. तत्कालीन समजधारणेचा विचार केला तर, चूक आसो की नसो, अहल्या भ्रष्ट झाली, ही वस्तुस्थिती होती. त्यामुळे अहल्या एक प्रकारे वाळीत टाकली गेली असेल. तिच्यावर सामाजिक बहिष्कार टाकला गेला असेल. तिचे अस्तित्व नगण्य, अर्थशून्य मानले गेले असेल. अपराध इंद्राचा असेल, हे मनोमनी पटूनही इंद्रासारख्या देवराजाच्या विरुद्ध जाण्याची हिंमत कोण दाखवणार? त्यापेक्षा अहल्येला दोषी ठरवणं, अपराधी ठरवणं जास्त सोपं होतं. जास्त सोयीचं होतं. त्यामुळे त्यांनी तिच्याशी बोलणं टाकलं असेल. नातं तोडलं असेल. तिच्याबरोबर कुठलाही व्यवहार करणं टाळलं असेल. ती अगदी एकटी, एकाकी पडली असेल, रस्त्यावरच्या शीळेसारखी.

श्रीरामाने अहल्येचा उद्धार केला, याचा अर्थ एका बाजूने अहल्येच्या मनातली अपराधीपणाची भावना दूर केली असेल. संवेदनाशून्य आणि बधीर मनोवस्थेतून बाहेर यायला तिला मदत केली असेल. स्वत:च्या अस्तित्वाची जाणीव करून घ्यायला मदत केली असेल. तिच्यात संवेदना, चेतना निर्माण केल्या असतील. त्याचवेळी सामाजिकदृष्ट्या, अहल्या निरपराध आहे, हे ठामपणे सांगून, तिच्या कुटुंबियांनी आणि समाजाने तिचा स्वीकार करावा, असे आवाहन केले असेल.

‘नरेंद्र कोहली’ या हिन्दी लेखकाने रामायणावर आधारलेल्या आपल्या ‘दीक्षा’ या कादंबरीत ‘अहल्योद्धारा’चा हाच सामाजिक आशय उलगडून दाखवलेला आहे. राम हा युवराज. सम्राट दशरथाचा पुत्र. भावी सम्राट. तेव्हा त्याची मान्यता, ही सर्वसामान्य प्रजेच्या दृष्टीने महत्वाची ठरली. अनुकरणीय ठरली. अहल्येला रामाने समाजमान्यता मिळवून दिली. तिचं निर्दोषत्व ग्राह्य धरलं. तिला एक प्रकारे न्याय मिळवून दिला. या अर्थाने रामाने अहल्येचा उद्धार केला.

केव्हा तरी ‘विनय राजाराम’ या हिन्दी कवयित्रीची ‘तुम अहल्या नहीं हो’ ही कविता वाचली आणि ‘अहल्या’ या शब्दाचा एक वेगळाच अर्थ मनाशी उलगडला. इथे ‘अहल्या’ ही सामाजिक नीति-नियमांच्या, कल्पना- धारणांच्या प्रस्ताराखाली दबल्या गेलेल्या स्त्रीची प्रतिनिधी म्हणून यते. या स्त्रीला ना स्वत:चं मन, ना इच्छा-आकांक्षा, ना कल्पना-भावना, ना संवेदना-चेतना. म्हणून कवयित्री म्हणते, ‘समाजाच्या प्रतारणेच्या, फसवणुकीच्या प्रस्तराखाली दबलेल्या हे नारी, तू प्रस्तर (दगड) नाहीस. तू परमाणू आहेस. (या विश्वाचे सृजन परमाणूपासून झाले, असे मानणारे एक तत्वज्ञान आहे.) त्यादृष्टीने तू विश्वाची जननी आहेस. निर्माती आहेस. ऊठ. जाग. स्वत:ला ओळख. आपल्या स्वत:च्या उद्धारासाठी, उन्नतीसाठी तू स्वत:च राम बन.

आपल्या स्वत:च्या विकल परिस्थितीला आपण स्वत:च अनेकदा कारणीभूत असतो, नाही का सख्यांनो? आपल्यातील ऊर्जेची, कार्यशक्तीची आपल्यालाच ओळख नसते. म्हणूनच आपली सखी कवयत्री ‘विनय राजाराम’ आपल्याला सांगते, ‘तू निश्चय कर, तू निश्चल नाही, चल बनशील.

‘अहल्या नहीं, हल्या बनोगी

मन-मस्तिष्क और कर्मशक्तीसे

अनुर्वरा नहीं, उर्वरा बनोगी’

हल म्हणजे नांगर. ‘हल्या’ म्हणजे नांगरण्यायोग्य, अर्थात सुपीक जमीन. ‘अहल्या’ म्हणजे बरड जमीन. ज्या जमिनीत नांगरणी-पेराणी करता येणार नाही अशी जमीन. ज्या जमिनीवर संस्कार करताच येणार नाहीत, ज्याच्यावा पडलेलं बीज, तसंच निष्फळ राहील, अशी अहल्या तू नाहीस. मन-बुद्धी, कर्म- शक्तीच्या योगाने तू ‘अनुर्वरा’ नाही, ‘उर्वरा’ बनशील. म्हणजे सुफलीत, सृजनशील बनशील. चांगल्या विधायक विचारांचं बी तुझ्या मन-बुद्धीत वाढेल. विकासेल. चांगलं कार्य तुझ्या हातून घडेल. नवसृजन होईल. ‘तू अहल्या नाहीस… अहल्या नाहीस…’

सखयांनो, आपल्या आसपास, जवळच्या- दूरच्या परिवारात एखाद दुसरी शिळेतील अहल्या आढळते. तिला दिलासा देणं, तिचा आत्मसन्मान जागृत करणं, तिला क्रियाशील बनवणं, एवढं तरी आपल्याला करायलाच हवं नाही का?

©  उज्ज्वला केळकर 

संपर्क – निलगिरी, सी-५ , बिल्डिंग नं २९, ०-३  सेक्टर – ५, सी. बी. डी. –  नवी मुंबई , पिन – ४००६१४ महाराष्ट्र

मो. 836 925 2454, email-id – kelkar1234@gmail.com 

≈संपादक –  श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares