☆ काय गंमत आहे बोलण्यात—☆ प्रस्तुती – सुश्री प्रभा हर्षे ☆
काय पण गंमत आहे बोलण्यात , आपण “शब्द” किती पटकन बदलतो,
कशालाही नावं देताना आपण त्यांच्या “स्थाना”वरून निश्चित ठरवतो.
नितळ रस्त्यावरच्या खराब भागाला “खड्डा” म्हणून हिणवतो…….
तर नितळ गालावरच्या छोट्या खड्ड्याला “खळी” म्हणून खुलवतो…….
भिंतीवर पडलेल्या काळ्या ठिपक्याला “डाग” म्हणून डावलतो…….
तर चेहऱ्यावर आलेल्या काळ्या डागाला “तीळ” म्हणून गोंजारतो…….
तुटुन पडलेल्या केसांच्या पुंजीला “जटा” म्हणून हेटाळतो…….
तर चेहऱ्यावर येणाऱ्या केसांच्या जोडीला “बटा” म्हणून सरकवतो…….
असंच असतं आयुष्यात आपल्याही “सोबती”नेच आपण तसे घडतो…….
चुकीच्या सोबतीने माणूस बहकतो, “योग्य” सोबतीनेच अधिक बहरतो……
एकदा प्रवीण दवणेंनी शांताबाई शेळके यांना विचारले की तुम्ही तुमच्या एका कवितेत आकाश आणि आभाळ असे दोन शब्द वापरले आहेत… दोन्हींचाही अर्थ पहायला गेला तर एकच आहे… मग असे दोन वेगळे शब्द का ..?
शांताबाईंनी किती सुंदर उत्तर दिले पहा.. त्या म्हणाल्या……
…चुकतोयस तू प्रवीण…
,..जे निरभ्र असते ते आकाश..
आणि ..जे भरून येते ते आभाळ..!!
…आणि म्हणूनच त्या निसर्गाच्या… त्या भगवंताच्या असीम कृपेला, त्याच्या मायेला आकाशमाया नाही तर आभाऴमाया म्हणतात ..!!
अशीच आभाळमाया तुम्हा सर्वांमध्ये राहू देत. हीच प्रार्थना
संग्राहिका : सुश्री प्रभा हर्षे
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
☆ आयुष्य कुणी जास्त जाणलं?… लेखक – अज्ञात ☆ प्रस्तुती – श्री शामसुंदर महादेवराव धोपटे ☆
एक आंधळा भिकारी रस्त्यावर एका बाजूला बसलेला….. त्याच्याकडे कुणाचेही लक्ष नाही.
तो एवढा दरिद्री आहे की त्याला अश्रू देखील महाग झालेत. गेली कित्येक वर्षे तो रडलेला नाही.
एक लेखक पूर्णपणे दिवाळं वाजलेला —- खिशात दमडीदेखील नाही आणि फिरायला बाहेर पडतो.
त्याची नजर त्या भिकाऱ्याकडे – आणि त्याच्या त्या करूण अवस्थेकडे जाते. त्या भिकाऱ्याच्या बाजूला एक पाटी, आणि दोन-तीन खडू पडलेले.
— हा लेखक त्या भिकाऱ्याकडे जातो आणि म्हणतो, ” मित्रा, मी एक लेखक आहे, ज्याच्याकडे एक पै देखील
नाही. पण माझ्याकडे कला आहे. माझ्याकडे शब्दांची शक्ती आहे. ती मी तुला देऊ शकतो. तुझ्या परवानगीने मी या पाटीवर काही लिहू का? “
” साहेब” भिकारी म्हणतो, ” माझ्याशी कुणी बोलतदेखील नाही. मी एक गरीब आंधळा भिकारी. तुम्हाला त्या पाटीचं जे ठीक वाटतं ते करा.”
— तो लेखक त्या पाटीवर काहीतरी लिहून निघून जातो.
— त्या क्षणापासून भिका-याच्या लक्षात येते की, एकदम जाणाऱ्या – येणाऱ्यापैकी प्रत्येकजण त्याच्याजवळ थांबून त्याच्या पुढ्यात पैसे टाकू लागलाय.
— थोड्याच वेळात तिथे पैशाची रास जमते. तो भिकारी बेचैन होतो. नाण्यांची रास वाढतच जाते. तो एवढा अस्वस्थ होतो की पैसे टाकणाऱ्यांपैकी एकाचा हात पकडतो आणि म्हणतो, ” साहेब, माफ करा तुमचा हात पकडल्याबद्दल. मी एक गरीब आंधळा भिकारी आहे. मला कृपा करुन जर या पाटीवर काय लिहीलंय ते वाचून दाखवलेत तर फार उपकार होतील हो.”
— तो माणूस पाटी उचलतो आणि वाचायला लागतो—-
— “ वसंत ऋतू म्हणजे बहरलेली सृष्टी — आणि माझ्या नशिबी हरवलेली दृष्टी.”
— भिका-याच्या गालावरुन अश्रू ओघळायला लागतात.
——– आयुष्य कुणी जास्त जाणलं?—–
या ओळी लिहिणाऱ्या लेखकानं?—- त्या ओळी वाचून पैसे टाकणाऱ्या लोकांनी?— की इतक्या वर्षांनी रडणा-या त्या भिका-यानं?—–
तुमचे डोळे चांगले असतील तर तुम्ही जगाच्या प्रेमात पडाल…
पण जर तुमची वाणी गोड असेल, तर हे जग तुमच्या प्रेमात पडेल…
माणसाला बोलायला शिकण्यास (किमान) २ वर्ष लागतात…
पण ” काय बोलावे? ” हे शिकण्यास पूर्ण आयुष्य निघून जाते…
— ओढ म्हणजे काय? – हे जीव लावल्याशिवाय कळत नाही…
— प्रेम म्हणजे काय? – हे स्वतः केल्याशिवाय कळत नाही…
— विरह म्हणजे काय? – हे प्रेमात पडल्याशिवाय कळत नाही…
— जिंकण म्हणजे काय?– हे हरल्याशिवाय कळत नाही…
— दुःख म्हणजे काय?– हे अपेक्षाभंग झाल्याशिवाय कळत नाही…
— सुख म्हणजे काय?– हे दुसऱ्याच्या हास्यात शोधल्याशिवाय कळत नाही…
— समाधान म्हणजे काय? – हे आपल्यात शोधल्याशिवाय कळत नाही…
— मैत्री म्हणजे काय?– हे ती केल्याशिवाय कळत नाही…
—आपली माणस कोण? – हे संकटांशिवाय कळत नाही…
— सत्य म्हणजे काय? – हे डोळे उघडल्याशिवाय कळत नाही…
— उत्तर म्हणजे काय?– हे प्रश्न पडल्याशिवाय कळत नाही…
— जबाबदारी म्हणजे काय?– हे त्या सांभाळल्याशिवाय कळत नाही…
आणि….
— काळ म्हणजे काय? –हे तो निसटून गेल्याशिवाय कळत नाही…
संग्राहक : श्यामसुंदर धोपटे
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
☆ फुगलेलं आणि रुसलेलं दार… ☆ प्रस्तुती – सुश्री मंजुषा सुनीत मुळे ☆
एक होती “ही” आणि एक होती “ती”.
दोघी समवयस्क आणि अनेक वर्ष शेजारी-शेजारी…. म्हणजे तशी “ही” राहायची पहिल्या मजल्यावर आणि “ती” दुसऱ्या. पण शेजारधर्म मात्र कायमच होता. कधी काही लागलं की हक्कानी सांगायच्या एकमेकांना.
दोन्ही घरचा एक तरी डबा किंवा वाटी कायम दुसऱ्या घरी असायचीच.
एके दिवशी “ही” च्या ह्यांना पावसामुळे किराणा आणायला जमलं नव्हतं. मग काय ?? “ही” गेली वाटी घेऊन साखर आणायला “ती” च्या कडे. “ती”नी सुद्धा “ही” चं हसत स्वागत केलं आणि दिली लगेच साखर……
“ही” चपला घालत थोडी आडोशाला काय गेली तशी “ती” जोरात पुटपुटली. “ रोजचाच ताप झालाय हा .. कटकट नुसती !!” … असं म्हणत वैतागून “धाडकन” दार लावलं जोरात. “ही” ला ऐकू गेलंच .. बहुतेक ऐकू जाण्यासाठीच जोरात बोलली होती “ती”.
मग “ही” ची पण जरा सटकलीच. तणतणत वरती आपल्या घरी आली. “ एक वाटी साखर काय मागितली तर
इतकं ?? जसं काही इस्टेट मागितली “ती” ची !!”…. असे ताशेरे झोडत “ही” नी दुप्पट जोरात आपलं दार लावलं.
इतकंss की खाली “ती” ला मुद्दाम ऐकू जावं.
तेव्हापासून कानाला खडा…. “ही” आणि “ती” यांचं संभाषणच बंद.
“ती”ला कळलंच नाही नेमकं काय झालंय. म्हणून एक-दोनदा गेली बोलायला. पण “ही” ढुंकुन सुद्धा बघायची नाही “ती”च्याकडे…… ‘ दोस्ती मे दरार… ‘
काहीच दिवसात बिल्डिंगला पालिकेकडून धोकादायकची पाटी लागली. मग सगळेच वेगवेगळ्या दिशांना पांगले.
दोघींचा काहीच संबंध आणि संपर्क उरला नाही. काळ लोटला .. वयं वाढली.
जवळ एक आध्यात्मिक शिबिर होतं चार दिवसांचं. दोघींनीही तिथे नाव नोंदवलं होतं. योगायोगाने दोघींचीही राहायची व्यवस्था एकाच खोलीत. पण खूप गप्पा माराव्या असं वाटत असलं तरीही मनात दुरावा होताच अजून.
पण “जुनं सगळं सोडून नव्याने संवाद साधा” अशी शिबिरातली शिकवण. म्हणून शेवटच्या दिवशी बोलल्या एकदाच्या…..
“ही” ची तणतण मागील पानावरून पुढे..
“ काय गं ?? xxxxxxxx .. इस्टेट मागितली होती का ?”.. वगैरे वगैरे.
“ का गं ? असं का विचारतेस ??”
“ मग रोजची कटकट म्हणत इतक्या जोरात तोंडावर दार आपटलंस ते माझ्या ?
“ती” नी डोक्याला हात लावला.
“ बाप रे !! म्हणून बोलत नव्हतीस होय इतके वर्ष ??” अगंss ते मी तुला नाहीss त्या दाराला म्हणत होते आमच्या !! आठवतंय ना, पावसाळा होता तेव्हा ?? कसलं फुगलं होतं ते “दार”.. लावताना नाकी नऊ यायचे अगदी !! त्याला
रोजचा ताप म्हणाले होते ss !! ”
“ अय्याss हो का?? .. हो बरोबर .. आमचं पण दार खूप फुगलं होतं तेव्हा. “
……. दोघींचा “रुसवा” कारण दाराचा “फुगवा” … एवढंच कारण फक्त…
तेव्हा लक्षात ठेवा “ पावसाळ्यात दारं फुगतात ”. कुणी तुमच्या समोर असं धाडकन दार लावलं तर गैरसमज नसावा.
बिल्डिंगमध्ये दारांचा असा जोरात आवाज येऊ शकतो….. “ नवरा बायकोचं भांडण झालं असेल ” असे निष्कर्ष लगेच काढू नका.
आणि हो ss ……
आपण सगळ्यांनीच “ मनाची दारं ” मात्र फुगण्यापासून वाचवूया…. किलकिली तरी ठेवूया निदान…..
चांगले विचार आत यायला आणि वाईट बाहेर घालवायला.
सरतेशेवटी सगळ्यात महत्वाचं…
कधीही काही वाटलं तर आडपडदा न ठेवता लगेच बोलूया एकमेकांशी. बरेचदा कारण क्षुल्लक असतं पण आपण उगाच गंभीर समजतो.
— बघितलं ना ss “ही आणि ती”च्या चांगल्या मैत्रीची कितीतरी वर्ष वाया गेली.
— आणि कारण काय तर “ घराचं फुगलेलं ” आणि “ मनाचं रुसलेलं ” .. “दार”.
संग्राहिका: सुश्री मंजुषा सुनीत मुळे
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
☆ फक्त एक ‘इव्हेंट’…..अनामिक ☆ प्रस्तुति – सुश्री उषा आपटे ☆
अष्टमीचा अर्धचंद्र विलक्षण सौंदर्यानं लकाकत होता … समुद्राच्या लाटा त्याला भेटायला अधीर झालेल्या … आणि तशात पांढऱ्या शुभ्र वाळूवर प्रकाशाचा एक मोठा झोत पडला … तेज:पुंज पुष्पक विमान वाळूवर अलगद उतरलं … आणि दरवाजा उघडला. तसा इवलासा कान्हा धावत बाहेर आला … पाठोपाठ पेंद्या आणि बाकीचे बालगोपाल उतरले …
कान्हा वळला आणि उत्साहात म्हणाला … “ सखे हो … आज किमान दहा हंड्या फोडायच्या बरं .. दही .. दूध .. लोणी .. सगळी चंगळ करून टाकायची …” पेंद्या पुढे आला आणि कान्हाच्या डोईवरचं उत्साहानं थरथरणारं मोरपीस सरळ करत म्हणाला .. “आधी वाटणी ठरवायची कान्हा …” कान्हाला काही कळेना … तो म्हणाला ..
“ माझ्या हातचा दहीभाताचा घास मोत्यांच्या घासापेक्षा मौल्यवान मानणारी तुम्ही मंडळी .. अचानक ..”
पेंद्या म्हणाला …” काळ बदलला .. कान्हा … आता हंड्या दह्याच्या नाही .. रुपयांच्या लागतात. लाखांत बोली लागते .. मग आम्ही दहीभाताच्या घासावर समाधान कसं मानायचं ? “ कान्हा समजुतीच्या स्वरात म्हणाला .. “ मग काय हवं तुम्हाला .. ?” पेंद्यानं एकवार बाकीच्या बालगोपालांकडे पाहिलं … नि म्हणाला …” बक्षिसात सारखा वाटा … सेलिब्रिटी बरोबर फोटो .. स्टेजवर एन्ट्री … मिडियासमोर बाईटची संधी … आणि अपघाती विमा …” कान्हाला आता हसू आवरेना. तो थेट पुष्पक विमानाच्या दिशेनं चालायला लागला … पेंद्या गोंधळला … म्हणाला … “ इतकं टोकाचं का वागतोयस … ? काहीतरी सुवर्णमध्य काढू हवं तर … काही मागण्या कमी जास्त करून .. “
कान्हा वळला … हसला. पेंद्याजवळ आला .. खांद्यावर हात ठेवून ममत्वानं म्हणाला .. “ प्रयोजनच संपलंय रे सगळं … ! पेंद्या .. मला घरात दूध दही मिळत नव्हतं म्हणून हंड्या फोडायचो का रे मी .. ? एकत्र या … मनोरा बांधा आणि ध्येय साध्य करा … इतका साधा सरळ विचार … पण ते चार हात एकमेकांच्या खांद्यावर ठेवण्यामागे माणसं जोडण्याची प्रेरणा होती … मुठभर दहीभात घासाघासाने खाण्यात अर्धी भाकरी प्रेमानं वाटून घेण्याची दीक्षा होती .. तेव्हा कान्हा हाच सेलिब्रिटी होता … त्याचा सहवास ही मोक्षाची संधी होती आणि कान्हाची बासरी ऐकायला मिळणं ही बक्षिसाची सर्वोच्च कल्पना होती … अपघात होईल अशी साधी कल्पनाही कधी मनाला शिवायची नाही .. कारण साक्षात शिव सोबत असताना जीवाची भिती कसली … ? पण आता तुझ्या बोलण्यातून जाणवलं .. आता तो विश्वास संपलाय … एकत्र येण्याची उमेद संपलीय … थर वाढले … पण श्रद्धा संपलीय … माझा जन्म हा आता सोहळा न रहाता फक्त एक “ इव्हेंट “ बनलाय … आता इथे न आलेलंच उत्तम .. “ आणि त्यानं विमानात पहिलं पाऊल ठेवलं सुद्धा … पेंद्याला एव्हाना चूक कळली होती … तो घाईनं म्हणाला .. “ पण कान्हा …”
कान्हा शांत स्वरात म्हणाला .. “ अष्टमी येत राहील … पण त्यात कान्हा नसेल … आणि काळजी करू नकोस … कॉर्पोरेट विश्वात रमलेली माझी भक्त मंडळी कान्हाशिवाय हा सण असाच साजरा करत रहातील ..” असं म्हणून तो आत गेला सुद्धा … क्षणात आतून बासरीचे करुण स्वर ऐकू येऊ लागले आणि पेंद्यासह बालगोपाल मंडळी जड पावलांनी विमानाच्या दिशेने चालायला लागली..
लेखक : अनामिक
संग्राहिका : उषा आपटे
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
☆ ‘ओला’ पेक्षा कोरडंच जळणारे… अंबर कर्वे ☆ प्रस्तुती – सौ.बिल्वा शुभम् अकोलकर☆
पुण्यातली सार्वजनिक वाहतूक बेकार आहे, म्हणून एवढी वर्षे पुण्यातले रिक्षावाले मुजोरी करतायत. कालच एक पोस्ट वाचली – फेसबुक आणि whatsapp वर. ह्या लोकांचे नखरे आहेत म्हणून उबेर, ओलाचा व्यवसाय सुरु झालाय. अगदी तंतोतंत खरंय. मी तर म्हणतो रिक्षा, टॅक्सीवाल्यांची ही मुजोरी जशी वाढत जाईल त्या प्रमाणात उबेर, ओला ह्यांचा व्यवसाय वाढत जाणारे.
उबेर, ओला कॅबच्या बुकिंगमधला कन्व्हिनियन्स, त्यांची सर्व्हिस, त्यांचा USP आहे. जेवढ्या पैश्यात कुठल्याही अवस्थेच्या गाडीतून हे रिक्षावाले नखरे करून उपकार केल्यासारखे पॅसेंजरना घेऊन जातात, तेवढ्याच पैशात हे ओला’वाले त्यांना एसी लावून गाडीतून पाहिजे तिथे नेतात. जेवढे त्यांच्या मीटरवर दिसतात त्याच पैशांचा आपल्याला मेसेज येतो. तेवढे पैसे कॅश, कार्डनी दिले की विषय संपला. फक्त ‘पीक अवर्सना’ हे लोक जास्त चार्ज करतात. ज्या लोकांना त्या वेळाची किंमत असते, ते जास्त पैसे देऊन जातात.
ओला काय किंवा उबेर काय, ह्यातले ड्रायव्हरही रिक्षावाल्यायेवढीच हातावर पोट असलेलीच लोकं आहेत. त्यातल्या बहुतेकांनी त्यांच्या स्वतःच्या गाड्या भाडेकरारावर ह्या कंपन्यांना दिलेल्या आहेत. त्यांच्या गाड्या फोडून ह्या कंपन्यांना काही एक फरक पडत नाही. रिक्षावाले त्या बिचा-या गाडीवाल्याच्याच गाडीचं नुकसान करतायत आणि एका गरीबाचाच रोजगार बुडवतायत. ह्याच्यामुळे लोकांच्या वेळेला भाडे न नाकारणाऱ्या, पैश्यांच्या सापडलेल्या थैल्या प्रामाणिकपणे परत करणाऱ्या सामान्य, प्रामाणिक रिक्षावाल्यांबद्दल ज्यांना आपुलकी वाटते, अश्या माझ्यासारख्या असंख्य लोकांची सहानुभूती हे समस्त रिक्षावाले गमावून बसतायत. आयुष्यभर विरोधाला म्हणून विरोध करणाऱ्या नेत्यांच्या नादी लागून दुर्दैवानी एक दिवस ह्या रिक्षावाल्यांचंच भवितव्य अंधारात येणारे, हे ह्यांना कोणीतरी समजावून सांगायची गरज आहे. ओल्याबरोबर सुकंही जळतं म्हणतात. इथे ‘ओला’ न जळता फक्त कोरडंच जळणारे, हे लक्षात घ्या.
स्वतःची मुजोरी टिकवायला म्हणून दुस-याचा धंदा बंद पाडायचे दिवस गेले आता. तसा विचारच करायचा झाला तर रिक्षा आल्यावर टांगेवाल्यांनी किती दिवस संप केला होता? किती रिक्षा फोडल्या होत्या? एक्प्रेस वे झाला, लोकं गाड्यांनी जास्ती जायला लागले, म्हणून रेल्वेवाल्यांनी संप केला होता का?
रिक्षावाल्यांनो, काळाची पावले ओळखा, कुठलेही भाडे न नाकारता, दिवसाच्या कुठल्याही भाड्याला दीडपट वगैरे चार्ज न घेता, इमानदारीत रिक्षा चालवून दिवसाला ९००-१००० रुपये कमावणारा रिक्षावालाही माहित्ये मला. अशी सर्व्हिस दिलीत तर लोक आपणहून कोप-यावरच्या स्टँडवरची रिक्षा पकडून जाणे पसंत करतील. तुम्हाला एकही दगड उचलायची वेळ येणार नाही.
साधारण ९६-९७ साली रिक्षावाल्यांनी बेमुदत संप पुकारल्यावर (बहुतेक ग्राहक पंचायतीनी) पुण्यात ‘लिफ्ट पंचायत’ हा उपक्रम सुरु केला होता. एकटे जाणाऱ्या प्रत्येकांनी हात दाखवेल त्याला आपल्या गाडीत लिफ्ट द्यावी, अशी साधी आणि मोफत कल्पना होती. पुण्यातल्या लोकांनी मुजोरी रोखायला ती चकटफू आयडिया डोक्यावर उचलून धरली. ती एवढी यशस्वी झाली की, माझ्या आठवणीत पुढची २-३ वर्षं तरी कुठल्याही मागणीसाठी पुण्यात रिक्षावाल्यांचा संप झाला नाही.
— आज गरज आहे, अश्याच किंवा अगदी ह्याच उपक्रमाची. मी माझ्यापासून आजच सुरुवात करतोय. हात दाखवेल त्याला, शक्य असेल तिथपर्यंत, गाडीत लिफ्ट देण्याची. बघू, ही मुजोरी टिकते, का सामान्य नागरिकाची ताकद भारी पडते ते?
बंद_संप_ह्यावरच_बंदी_आणा
लेखक : अंबर कर्वे
संग्राहिका : सौ.बिल्वा शुभम् अकोलकर
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈