मराठी साहित्य – पुस्तकांवर बोलू काही ☆ “ क्लेशवृक्षाच्या छायेत” (कविता-संग्रह) – कवी : राजकुमार कवठेकर ☆ परिचय – श्री सुहास रघुनाथ पंडित ☆

श्री सुहास रघुनाथ पंडित

?पुस्तकावर बोलू काही?

☆ “ क्लेशवृक्षाच्या छायेत” (कविता-संग्रह) – कवी : राजकुमार कवठेकर ☆ परिचय – श्री सुहास रघुनाथ पंडित ☆

पुस्तक : क्लेश वृक्षाच्या छायेत 

… बहरलेल्या काव्याचा मोहोर

कवी : राजकुमार कवठेकर 

 ९४२११०५८१३

प्रकाशक : अक्षरदीप प्रकाशन, कोल्हापूर 

 ९३०९१३८४४३

पृष्ठे : १२०

मूल्य : रु. २००/-

आयुष्याचे वस्त्र हे सुखदुःखाच्या धाग्यांनी विणलेले असले तरी सुखापेक्षा दु:खाचे धागेच जास्त दाट आहेत कि काय असे वाटावे असे सर्वसामान्य माणसाचे जगणे असते. थोडेसे सुखही लाभले नाही अशा दु:खितांची संख्याही काही कमी नाही. किंबहुना दु:ख हेच जीवनातील अंतीम सत्य आहे असे म्हटले तर चूक ठरु नये. कारण ते प्रत्येक व्यक्तीने अनुभवलेले असते. ते दु:ख स्वत: भोगणे, दु:खाची जाणीव असणे,

दुस-याच्या दु:खाने व्यथीत होणे आणि त्याच दु:खाचा शोध घेत घेत याच जन्मात त्याची पाळेमुळे छाटून टाकण्याचा प्रयत्न करताना या सर्व वेदना आपल्या शब्दातून व्यक्त करणे ज्याला जमते तोच क्लेश वृक्षाच्या छायेलाही आपलेसे करू शकतो. असा कवी मग कुठलीही खंत न बाळगता आपल्या सोसण्याच्या तपामुळे क्लेशवृक्षालाही आनंदाचे फळ येईल असे आत्मविश्वासपूर्वक म्हणू शकतो. क्लेशवृक्षाच्या छायेत बसुनही

” होईल कधितरी स्वप्न हासरे खांद्यावर चे मूलऽऽ

क्लेशतरुवर फुलेल जे फुल पडेल त्याची भूल ऽऽ “

असे म्हणणारे मिरजेचे कवी, प्रसिद्ध गझलकार श्री. राजकुमार कवठेकर यांच्या ‘क्लेशवृक्षाच्या ‘

प्रत्येक पानापानातून याची खात्री पटते.

दु:खाची महिरप असणा-या या कविता संग्रहात डोकावून पाहिले तर, काहीशा आत्ममग्न असणा-या या कविने निसर्ग भावभावनांच्या विविधांगी रचना समाविष्ट केल्या आहेत. त्यामुळे आयुष्यातील चढ उतारामुळे जगणे जसे जगावेसे वाटते तितक्याच उत्सुकतेने आपण हा संग्रह शेवटपर्यंत वाचत जातो. बोलक्या मुखपृष्ठातून व्यक्त होणारा क्लेशवृक्ष आणि त्याची छाया ओलांडून पुढे जाताना, कविच्या मनाची स्पंदने शब्दाशब्दातून ऐकू येतील अशा भावकविता वाचताना एकामागून एक कविता वाचण्याची ओढ लागून रहाते.

स्मरणांचा जाच चुकत नाही. दु:खाचा पहारा उठत नाही. अशा अवस्थेत जगण्याचा हा अवजड मेणा कुठवर वाहुन न्यायचा असा प्रश्न पडणे स्वाभाविक आहे. वास्तवाच्या वणव्यात मन होरपळत असताना आणि या छळवादी आयुष्याला सामोरे जात असताना दमछाक तर होतेच आहे. पण एवढे सहन केल्यावर तरी आशेची रम्य पहाट दाखवणारे एखादे वळण या वाटेवर येणार आहे का? वारंवार अश्रूच वाट्याला यावेत असा वेदनेचा शाप आयुष्याला लागला आहे. सुखांना मोकळेपणाने नांदताच येत नाही. सांत्वनाच्या आहेरांनी मनावरच्या जखमा भरून येत नाहीत. स्वप्नांचा पाठलाग चालुच आहे. या भ्रमंतीत स्वत:ला हरवून बसावे, स्वतःचा शोध स्वतःला लागूनच नये अशी अवस्था झाली आहे. हाताच्या मुठी वळल्या तरी ठोस पाऊल उचलावे एवढे बळ आणायचे कुठून? जगण्यातली अगतिकता पराकोटीला गेली आहे. सगळं समजत असून सुद्धा आंतरिक समुद्राच्या लाटा आतल्या आतच हेलकावे घेत असतात. रोज उगवणारा दिवस ही इतरांसाठी सकाळ असली तरी आपल्यासाठी मात्र ती आणखीन एका वजावटीच्या दिवसाची सुरुवात असते हे कठोर सत्य नाकारता येत नाही. दु:खाच्या सागरात हेलकावे खाणारे हे जगणे, पराभवाने ग्रासले असले तरी यशाचे गीत म्हणणे, कविने सोडून दिलेले नाही. मनातील दुर्दम्य इच्छाशक्तीने दु:खावर मात केली आहे आणि काटेरी प्रारब्धाला आशेचे जरतारी वस्त्र नेसवण्याचे धैर्य कविला मिळाले आहे. फुटक्या आरशात स्वत:चीच शेकडो प्रतिबिंबे दिसावीत तसा मी स्वत:ला पाहताना दिसतो आणि समजतच नाही मी नेमका खरा कोणता? मग लक्षात येतं, आपण तर शब्दांच्या राईत मग्न असतो. ठरलेली वाट नसतेच आपली. आपला आपल्याला तरी भरवसा आहे का? ज्यांच्यात असतो त्यांचेही आपण नसतो. कदाचित हे वेगळेपण हीच आपली खरी ओळख असेल. कविच्या आत्ममग्नतेतून आत्मशोधाचा हा प्रवास आपल्यालाही अंतर्मुख करतो.

शेवटी जगणं म्हणजे तरी काय असतं? कवीच्याच शब्दात सांगायचं तर :

जगणं असते एक कविता, कळली तर पटकन कळणारी… नाही तर आमरण छळणारी…

आपल्या आत्ममग्नतेमुळे आयुष्यातील महत्त्वाचे कितीतरी क्षण निसटुन गेले आहेत. आयुष्य हेळसांडून गेले आहे. त्यामुळे असाही प्रश्न पडतो की

‘ कुठवर जगण्याचा जाच हा सांग सोसू

 कुठवर हसण्याचे रेशमी वस्त्र नेसू?

 बहरत असताना झाड निष्पर्ण झाले

 फिरुन फिरुन पक्षी कालचे दूर गेले “

जागतिकीकरण आणि शहरीकरणाचे चटके कवीला ही जाणवत आहेत. सुखाच्या चेह-याचे पोर्ट्रेट आयुष्यभर अंगावर मिरविले तरी भंगत जाणारे नातेसंबंध कितीही जोडायचा प्रयत्न केला तरी पूर्ण एकजीव होत नाहीत हेच खरे. मग त्या पोर्ट्रेटच्या सौंदर्याकडे लक्ष न जाता केलेली डागडुजी मात्र ठळकपणे डोळ्यात भरुन राहते आणि मन ठसठसत राहते. बाल्कनीतली बाग, कॉलबेलच्या चिमणीचा चिवचिवाट, पोर्ट्रेट मधला समुद्र, अशा कृत्रिम जीवंतपणाच्या खुणा कवितेतून स्पष्टपणे दाखवल्या आहेत. दुसरीकडे ‘ दोघांचेच विश्व ‘ असले तरी सकाळपासून संध्याकाळपर्यंत चक्राकार गतीने व्यापलेल्या या जगण्यात परस्परांची भेटच होत नाही, मग संवाद तर दूरच. मोग-याचा गजरा मात्र या सर्व धावपळीत मूकपणे दरवळत राहतो. समोर आलेल्या सुखाला नाकारायच तर नाहीच. पण या सुखाच्या चाहुलीने हुरळून न जाता भोगलेले दु:ख अजूनही मनात खोलवर सलत असतं. त्यामुळे सुखाच्या श्रावणातही दु:खाचा वैशाख वणवा विझलेला नसतोच.

 ” या जगण्याचे हे असेच

 उमलत्या वेळीच ग्रासले कातरवेळीचे भय…

 कठोर निर्णयाच्या वेळीच नेमकी

 दाटून येते जुनी सय… “

तरीही

 ” तरिही जगणे… तरिही जगणे

 जरी न काही मनाप्रमाणे 

 रोज मनाने मनात कुढणे

 ठेऊन ओठांवरती गाणे “

या खंबीर मनाने प्रवास अव्याहतपणे चालुच असतो. ओळखीची खूण सापडत नाही. स्वप्नातला गाव दिसत नाही. या एकाकी प्रवासामुळे मन कधीतरी खिन्न

होणारच. मग वाटतं,

 ” पालटावा हा ऋतू माझी शमावी वेदना

 श्रावणाचा मेघ दाटो चिंब होऊ दे मना 

 सावलीचा दो घडीचा लाभु दे रे गारवा 

 या तमी एकांत रानी रे दिसावा काजवा “

नियतीच्या फे-यामध्ये सुखाची सावली येईल तेव्हा येवो. पण मनाची वेदना शमविण्यासाठी निसर्गाशिवाय दुसरा मित्र कोण असणार? या संग्रहात समाविष्ट असलेल्या निसर्ग कविता म्हणजे कविने हातात कुंचला न घेता त्याच्या मनाच्या कॅनव्हासवर शब्दांचे फटकारे मारुन चित्रित केलेली देखणी निसर्ग चित्रेच आहेत. म्हणून तर

 ” ढगांनी जसे ग्रासिले सुर्यबिंबा

 क्षणार्धात सर्वत्र सांजावले

 चकाकून जाती विजांच्या शलाका

 थवे पाखरांचे घरी पातले “.

किंवा सरी बरसू लागल्यावर

 “. लडीवाळ बाळापरी पावसाच्या

 नभाच्या कुशीतून आल्या सरी

 झळांचा बने थंडसा मंद वारा

 घुमे रानझाडीतुनी बासरी “.

यासारखे टपोरे शब्द कविच्या मानसमेघातून बरसु लागतात.

 ‘ काजळसे जमले मेघ, विजेची रेघ

 कुठे चमचमते

 ही हवा गार बोचरी, उठे शिरशिरी 

 कापरे भरते ‘ ‌

असो किंवा

 ‘ वा-याला कसले पिसे कसा घुमतसे

 नाचवी राने…

 पाण्यास मिळाले सूर खूर चौखूर

 उधळी हर्षाने… ‘.

सारख्या लयबद्ध निसर्ग कविता वाचताना मन नकळतपणे डोलू लागते. याठिकाणी सूर, खूर, चौखूर

या शब्दांतून साधलेला अनुप्रासात्मक नाद लक्ष वेधून घेणारा आहे. पावसाच्या आगमनात लग्न सोहळ्याचे मांगल्य पाहणा-या या कविला म्हणून तर पूर्ण खात्री आहे की काही काळासाठी आभाळ रुसल तरी

 “. रुसण्यातुनही हसेल माया

 काठिण्याला फोडित पाझर

 सळसळणारे वैभव लेईल 

 उद्या ; आजचे श्रांत कलेवर “

अशा निसर्गात रममाण होतानाच कविच्या हाती एक पत्र येते… तिचे ते पत्रही पाऊसरुपीच असते. भरुन आलेलं

आभाळ आणि भरुन आलेलं मन, एकीकडे घनांची तर दुसरीकडे शब्दांची होणारी दाटी, अशा मनातून कोसळणा-या पावसात चिंब भिजणारं हे पत्र आपल्यालाही कधी भिजवून टाकतं समजतही नाही.

पण हा निसर्ग असा सर्वांगानं तसाच असला तरी

‘. पाखरं ‘ मात्र पहिल्यासारखी राहिली नाहीत असे कविला वाटते. ती धिटावत चालली आहेत. घाबरणं नाही. थवेही नाहीत. चिवचिविट तर कधीच बंद झालेला.

‘ पाखरं ‘ ही रुपकात्मक कविता नव्या पिढीच्या जीवनपद्धतीचे दर्शन घडवते.

या काव्यसंग्रहात काही कविता ‘ त्याच्या ‘ आहेत, काही ‘तिच्या ‘ आहेत तर काही दोघांच्याही आहेत.

प्रेम म्हटलं की माया, हुरहूर, रुसवा, विरह, समज, गैरसमज हे सगळं आलंच. वाढत्या वयाबरोबर येणारा समंजसपणा प्रेमाकडे पाहण्याची दृष्टीही बदलून टाकतो. अपेक्षाही बदललेल्या असतात. हे सर्व भाव व्यक्त करणा-या श्री. कवठेकर यांच्या कविता वाचताना त्यांच्या मनातील कोमल भावभावना अनुभवायला मिळतात.

एका कवितेत ते म्हणतात, तिला भेटायला निघण्यापूर्वीच ते तिच्यापाशी जाऊन पोहोचलेले असतात. त्याच कवितेच्या शेवटी ते म्हणतात मी परतूनही नसतो परतलेला. तिला भेटण्याचा आवेग आणि तिचा निरोप घेतला तरी तिथेच गुंतून राहात मनाचे घुटमळणे कविने नेमक्या शब्दात मांडले आहे. तिच्या असणं म्हणजे ‘ सर्वव्यापी निरभ्र चांदणगर्भ आकाश ‘असतं.

तिच्यामुळेच तर त्याच्या आयुष्यातील अज्ञातवास संपून नवं पर्व सूरु होत असतं. या सुखाच्या चांदण्यामुळेच की काय, तिचा विरह झाला तरी तिच्या आठवणीने, तिच्या नुसत्या स्मरणानेही विरहाच्या दु:खाची बेडी तुटते. तिकडे तिची काय अवस्था असते? ती म्हणते

 “तुझा भास होई तुझी हाक येई 

 नको वाटते ही सुखाची घडी

 तुझ्या वाचुनी रे सुन्या मैफिली या

 ऋतू… आसवे… हासणे… बेगडी.

साहजिकच अशा या सखीच्या बाबतीत मग कविला वाटते,

 ” तुला वादळांचे नको हेलकावे 

 तुझे शीड डौलात जावो पुढे

 कधी भेटता तू कुठे ; ओळखीने

 पहावे… हसावे… पुरे एवढे… “

त्याला तिच्या फक्त प्रेमाचीच जाणीव आहे असे नाही तर तिच्या कर्तृत्वाचीही जाण आहे. म्हणूनच एकीकडे घर संसार आणि दुसरीकडे स्विकारलेली व्यावसायिक जबाबदारी समर्थपणे पेलताना तिची होणारी दमछाक आणि दिसणारी कर्तव्य तत्परता कविच्या नजरेतून सुटलेली नाही. कार्यमग्न असणारी तिची बोटं आणि वेळेला कवेत घेण्यासाठी तिच्या पावलांची चाललेली लगबग यांचा मेळ घालता घालता तिला दावं सोडून पळता येणार नाही, ही वस्तुस्थिती आहे. मग कवी लिहून जातो,

 ” सखी कळते मलाही, काय दुखते सलते

 संस्कारांच्या उंब-यांशी, कसे पाऊल अडते “

अशी सखी लाभली हे आपले भाग्यच आहे. कवी म्हणतो

” जन्म अपुराच माझा तुझे फिटावया ऋण

जन्म पुन्हा पुन्हा लाभो तुझ्या इतका सुजाण “

हे भाव जसे नेमक्या शब्दात व्यक्त झाले आहेत, अगदी त्याचं नेमकेपणाने कविने आईच्या जाण्यानंतर भाव व्यक्त केले आहेत. आई गेल्यानंतर

” घर माझ्यासम आईला तेव्हाच पोरके झाले

कुठल्याच सुखाचा धागा फाटल्या मनास बसेना “

आणखी वेगळ्या शब्दांची आवश्यकता आहे का?

क्लेशवृक्षाच्या छायेत बसून भवताल न्याहाळत असताना कविनं जे अनुभवलं, जी स्वप्नं पाहिली ती आपल्या समर्थ लेखणीतून उतरवत असताना

शब्दसंपदा, उपमा, कविकल्पना अगदी सहजपणे कवितेत गुंफल्या आहेत. अलंकारिक शब्दांचे अप्रस्तुत प्रदर्शन टाळून मनाला मोकळे करणारे शब्द त्यामुळेच वाचकाला आपल्या जवळचे वाटतात.

स्मरणांचा जाच,, दु:खाचा पहारा, वास्तवाचा वणवा, स्वप्नांचे वेफर्स, बेदरकारपणाची झुलपे, भयपटासारखे सरकणारे आयुष्य, निनादत येणा-या वेदना, धीराचा कलंडणारा माठ, श्वासांचे शीड, व्याकूळपणे तिष्ठणारी माया, जडत्वापोटी येणारे तान्हुले हासरे, ही त्यांची काही उदाहरणे. किंवा

” नको म्हणूस ‘ जुनेरं ‘ जरी वस्त्र धसावले

 काल फाटक्या दिवसांना ऋतू यांनीच दाविले “

या दोन पंक्तींतून कविने गृहिणीला ज्या शब्दात आश्वस्त केले आहे ते शब्द कुणाचाही ‘ फाटका ‘ संसार झाकून घ्यायला पुरेसे आहेत.

कविच्याच शब्दात सांगायचं तर

” आणि यांच्याही पल्याड, खूप काही उरणारे

 खोल खोल काळजाशी, फुलणारे… सलणारे… “

असे आहे ज्याच्यावर लिहायला हवं असं वाटत.

पण

” कळते सारे : हवे उठाया

 बाकी रस्ता अजुन खूपसा

हवा आवरायास पसारा,

 हवी धराया पुन्हा उभारी “

हे कविचे सांगणे लक्षात घेऊ आणि

“आता मज नाही, कुठलीच खंत

 मन हे दिगंत… होऊ पाहे

अशा सात्विक समाधानाने हा काव्य शोधप्रवास थांबवतो.

 

पुस्तक परिचय – श्री सुहास रघुनाथ पंडित

सांगली (महाराष्ट्र)

मो – 9421225491

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – पुस्तकांवर बोलू काही ☆ “द सिक्रेट विस्डम ऑफ नेचर” – इंग्रजी लेखक : पीटर वोहललेबेन – मराठी अनुवाद : गुरुदास नूलकर ☆ परिचय – श्री हर्षल सुरेश भानुशाली ☆

श्री हर्षल सुरेश भानुशाली

? पुस्तकावर बोलू काही ?

☆ “द सिक्रेट विस्डम ऑफ नेचर” – इंग्रजी लेखक : पीटर वोहललेबेन – मराठी अनुवाद : गुरुदास नूलकर ☆ परिचय –  श्री हर्षल सुरेश भानुशाली ☆

पुस्तक : द सिक्रेट विस्डम ऑफ नेचर (मराठी)

लेखक : पीटर वोहललेबेन

अनुवाद: डॉ. गुरुदास नूलकर

प्रकाशक : मनोविकास प्रकाशन

पृष्ठ: २००

मूल्य: ३००₹

पीटर वोललेबेन यांचे पहिले पुस्तक ‘द हिडन लाइफ ऑफ ट्रीज’ याला मराठी वाचकांचा भरभरून प्रतिसाद मिळाला. या पुस्तकाने आपल्याला वनस्पतींच्या अज्ञात विश्वाची अतिशय सोप्या भाषेत ओळख करून दिली. ‘द सिक्रेट विस्डम ऑफ नेचर’ हे त्यांचे पुढचे पुस्तकही सोप्या भाषेत रंजक गोष्टीने सजलेले आहे. निसर्गातील क्लिष्ट गुंतागुंती, सजीव आणि निर्जीव घटकांमधील परस्परसंबंध आणि या मध्ये मानवाची भूमिका समजावून सांगताना वोललेबेन यांनी पुन्हा एकदा खूपच वाचनीय पुस्तक आपल्यासमोर आणले आहे.

यातील गोष्टी जरी प्रामुख्याने युरोप खंडावरील असल्या तरी निसर्गाचे नियम पृथ्वीवर कुठेही बदलत नाही. समशीतोष्ण प्रदेशात जो निसर्गाचा अनुभव येतो तो आपल्यासारख्या उष्णकटिबंधीय वातावरणाच्या देशात अधिक स्पष्ट दिसतो. याचे कारण म्हणजे आपल्या इथे वर्षभर सूर्यप्रकाश आणि उत्तम माती आहे. यामुळे वनस्पतींच्या असंख्य प्रजाती इथे आढळतात, आणि त्यांच्यावर उभी असलेली वैविध्यपूर्ण अन्नसाखळी पोसली जाते.

भारतातील निसर्ग हा इंद्रधनुष्यासारखा अनेक रंगांनी सजलेला आहे. हिमालयातील हिमरेषेपासून ते कच्छच्या मिठाच्या रणापर्यंत, पश्चिम घाटातील सदाहरित जंगलांपासून ते सुंदरबनच्या खाऱ्या खाड्यांपर्यंत-प्रत्येक प्रदेश एक वेगळी कथा सांगतो. अन्नसाखळी हा त्या कथांमधील धागा. ही अन्नसाखळी फक्त “कोण कोणाला खातं” इतकी साधी नाही; ती संबंधांची, परस्परावलंबनाची, आणि न जाणवणाऱ्या संतुलनाची एक जिवंत कहाणी आहे.

तुम्हाला हे माहीत होतं का?

पृथ्वीच्या परिभ्रमणावर झाडांचा प्रभाव पडतो! किंवा लांडगे नदीचा प्रवाह बदलतात हे तरी? आणि रानडुकरांच्या संख्येवर गांडुळं नियंत्रण ठेवतात?

निसर्गसृष्टीतले परस्परसंबंध गुंतागुंतीचे आणि क्लिष्ट असतात. यांपैकी अनेक संबंधांची आपल्याला कल्पनाही नाही. पण याच नात्यांमुळे निसर्गात सूक्ष्म समतोल राखला जातो. वनरक्षक म्हणून अनेक दशकं केलेल्या कामाचा अनुभव आणि नवनवीन वैज्ञानिक संशोधनाचा आधार घेत पीटर वोललेबेन आपल्याला एका वेगळ्याच दुनियेत नेतात. त्यात निरनिराळे प्राणी, वनस्पती, नद्या, दगड आणि हवामान एकमेकांबरोबर सहकार्य करत निसर्गाची नाजूक प्रणाली संतुलित ठेवतात.

रोजामंड यंग, दि सिक्रेट लाइफ ऑफ काउजच्या लेखिका म्हणतात – – 

“ पीटर वोललेबेन हे फक्त डोळ्याने बघत नाहीत. एका दिव्य दृष्टीतून त्यांना निसर्ग दिसतो. आपल्यासारख्या प्रत्येकाला त्यांच्याकडून काहीतरी शिकण्यासारखं आहे. “ 

अद्भुत! निसर्गात सगळे एकमेकांशी जोडलेले असतात याची वोललेबेन आपल्याला आठवण करून देतात.

परिचय : श्री हर्षल सुरेश भानुशाली

पालघर 

मो. 9619800030

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – पुस्तकांवर बोलू काही ☆ “डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे संवैधानिक चिंतन” – लेखिका :  श्री रमेश पतंगे ☆ परिचय – श्री हर्षल सुरेश भानुशाली ☆

श्री हर्षल सुरेश भानुशाली

? पुस्तकावर बोलू काही ?

☆ “डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे संवैधानिक चिंतन” – लेखिका :  श्री रमेश पतंगे ☆ परिचय –  श्री हर्षल सुरेश भानुशाली ☆

पुस्तक : डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे संवैधानिक चिंतन

लेखक: रमेश पतंगे

पृष्ठ: १३६

मूल्य: २५०₹ 

प्रस्तावना : मा. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

ज्येष्ठ विचारवंत, पद्मश्री रमेश पतंगे हे सिद्धहस्त लेखक आहेत. सामाजिक समरसता चळवळ आणि राष्ट्रीय विचारांची पत्रकारिता यासाठी रमेशजींनी दीर्घकाळ काम केले. ‘साप्ताहिक विवेक’चे साक्षेपी संपादक म्हणून काम करताना त्यांनी महाराष्ट्राचा सामाजिक-राजकीय कृती आराखडा तयार करण्यासाठी विपुल लेखन केले आहे. मागील दहा वर्षांपासून रमेशजी पतंगे ‘भारतीय संविधान’ या विषयावर अभ्यासपूर्ण लेखन करीत असून आतापर्यंत त्यांची संविधान विषयातील नऊ पुस्तके प्रकाशित झाली आहेत. याच लेखनमालिकेत नव्या पुस्तकाची भर पडली असून ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे संवैधानिक चिंतन’ हे पुस्तक आता उपलब्ध झाले आहे.

संविधान म्हटले की, कायद्याचे पुस्तक, सर्वसामान्य नागरिकांचा संविधान विषयाशी फार संबंध येत नाही; पण रमेशजींचे वैशिष्ट्य असे की, याआधीच्या पुस्तकाप्रमाणे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे संवैधानिक चिंतन या पुस्तकातून कायद्यांच्या संकल्पना सोप्या भाषेत उलगडून सांगितल्या आहेत. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या दूरदृष्टीतून आणि सामाजिक न्यायाच्या परिवर्तनशील विचारांतून आकाराला आलेले भारतीय संविधान हे केवळ कायद्याचे पुस्तक नाही, तर ते आपल्या सामाजिक, आर्थिक आणि राजकीय क्रांतीचे भक्कम अधिष्ठान आहे. भारतीय संविधानाने कोणती क्रांती केली? या प्रश्नाचे उत्तर रमेशजींनी या पुस्तकात सोप्या पद्धतीने दिले असून ‘समान मत-समान पत’ (प्रत्येक मताचे समान मूल्य) ही संकल्पना उदयास येण्यासाठी संविधान सभेतील डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी मांडलेली भूमिका समजून घेणे आवश्यक आहे. रमेशजींनी आपल्या पुस्तकात यावर सविस्तर चर्चा केली आहे. आपण जेव्हा भारतीय संविधान निर्मितीच्या प्रक्रियेचा इतिहास अभ्यास करतो तेव्हा, असे लक्षात येते की, देशाला स्वातंत्रच मिळणार हे स्पष्ट दिसत असताना १९४६ मध्ये भारताच्या संविधान निर्मितीसाठी समिती गठीत करण्यात आली. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर बंगालमधून या समितीमध्ये निवडले गेले. देशाची फाळणी झाल्यानंतर मुंबई प्रांतातून त्यांना निवडून आणण्यासाठी डॉ. राजेंद्रप्रसाद व मुंबई प्रांताचे मुख्यमंत्री बाळासाहेब खेर यांनी प्रयत्न केले. असे असले तरी आपला भारत एकात्म आणि समतायुक्त असायला हवा, याबाबतचे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे चिंतन १९१९ पासून सुरू झाले होते. ब्रिटिश सरकारने पाठवलेल्या विविध कमिशनसमोर डॉ. बाबासाहेच आंबेडकरांनी ज्या साक्ष दिल्या आहेत, त्यांचा आढावा घेऊन या पुस्तकात रमेशजींनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची अलौकिक बुद्धिमत्ता आणि समाजचिंतन अधोरेखित केले आहे.

नव्याने स्वतंत्र्य होणाऱ्या भारत देशाच्या नागरिकांना नवीन ओळख देणारे संविधान साकार करताना आपली सामाजिक, धार्मिक परिस्थिती काय आहे, हे डॉ. बाबासाहेब आंबेडकर कधीच विसरले नाहीत. शतकानुशतके अन्याय आणि विषमतेच्या जोखडाखाली दबलेल्या समाजाला मुक्तीची दिशा देताना आणि नव्या राष्ट्राची पायाभरणी करताना जे मूल्याधिष्ठित मार्गदर्शन आवश्यक होते, ते आपल्या संविधानाने दिले. ही मूल्याधिष्ठित व्यवस्था संविधानाच्या माध्यमातून निर्माण करताना आपल्या देशातील समाज जीवन आणि इतिहास यांचा सुक्ष्म अभ्यास असणाऱ्या एकात्मिक समाज्याची आवश्यकता कायद्याच्या चौकटीत पूर्ण केली. संबिधान सभेतील शेवटच्या भाषणात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी म्हटले होते, ‘आपण अनेक वेळा पारतंत्र्यात गेलो कारण आपण संघटित नव्हतो. ‘ संघाटित समाज हा स्वतंत्र देशाचा आधार असणार आहे. हे भविष्यवेधी चिंतन डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी मांडले आहे. आज भारत एक स्थिर, सक्षम आणि प्रगतिशील राष्ट्र म्हणून जगात उभा आहे, त्यामागे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानिक चिंतनाची ठाम पायाभरणी आहे.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे विद्वान होते. अनेक देशांच्या संविधानाचा त्यांचा अभ्यास होता. एखादा कायदा करताना त्यासंदर्भात अन्य देशात काय विचार केला होता. येथे आपण काय विचार केला पाहिजे. यासंबंधी त्यांनी दीर्घ चर्चा केली आहे भारतीय समाजरचना, परंपरा आणि विविधतेचा सखोल अभ्यास असणाऱ्या मूल्यांचा समन्वय साधण्याची अद्वितीय क्षमता प्रदान करणारे संविधान निर्माण करताना आपली विद्वत्ता पणाला लावली होती. दीर्घ चिंतन, व्यापक अभ्यास आणि अनुभवाच्या आधारे तयार झालेल्या या संविधानाने सामाजिक न्याय, समता, स्वातंत्र्य, धर्मनिरपेक्षता आणि व्यक्तीच्या प्रतिष्ठेची मूल्यव्यवस्था इतक्या प्रभावीपणे मांडली गेली की, वंचित, शोषित आणि दलित घटकांना नवसंजीवनी मिळाली आणि भारतीय लोकशाही अधिक बळकट झाली. याचे श्रेय डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे आहे.

आपले संविधान हा केवळ एक स्थिर दस्तऐवज नाही; तर तो काळानुसार विकसित होणारा, बदलत्या परिस्थितींना सामोरे जाणारा आणि समाजाच्या गरजांनुसार स्वतःला परिष्कृत करणारा जिवंत दस्तऐवज आहे. शासनव्यवस्थेला दिशा देणारे आणि नागरिकांच्या हक्कांचे रक्षण करणारे हे एक प्रभावी साधन आहे. सामाजिक न्याय, समान संधी, उत्तरदायी प्रशासन आणि लोकशाहीतील सक्रिय सहभाग या मूल्यांचे संरक्षण करण्यामध्ये संविधानाची भूमिका अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. हे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी वेळोवेळी स्पष्ट करून आपले संविधान हे मानवकेंद्री आहे हे आग्रहाने सांगितले आहे.

आज भारत विकासाच्या विविध क्षेत्रांत प्रगती करत असला, तरी त्या प्रत्येक पावलामागे संविधानिक चौकटीचे भक्कम अधिष्ठान आहे, ही जाणीव ठेवणे आवश्यक आहे. आपल्या संवैधानिक जाणिवा अधिक प्रबळ करण्याची ही वेळ असून सर्वसामान्य नागरिकांसोबत राजकीय क्षेत्रात, प्रशासन क्षेत्रात काम करणाऱ्या सर्वच व्यक्तींनी संविधानाचा गाभा समजून घेणे आवश्यक आहे. या पार्श्वभूमीवर रमेश पतंगे यांच्या या पुस्तकातून संविधानाकडे पाहण्याचा डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा सखोल आणि चिंतनशील दृष्टिकोन आपल्यासमोर मांडला जातो. या महत्त्वपूर्ण पुस्तकाचा सर्वांना उपयोग होईल, असा विश्वास वाटतो.

संविधानाविषयी व्यापक जनजागृती होणे हीच सशक्त लोकशाहीची खरी गरज आहे. ही जनजागृती करताना डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी केलेल्या दीर्घ चिंतन व परिश्रमांना आपण सदैव लक्षात ठेवले पाहिजे. हे पुस्तक त्यादृष्टीने खूप महत्त्वाचे असून ते प्रत्येक नागरिकासाठी, कार्यकर्त्यासाठी मार्गदर्शक ठरेल, असा मला विश्वास वाटतो.

1949 साली संमत झालेल्या संविधानाच्या अनेक कलमांविषयी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी १९१९ पासून केलेले मूलगामी चिंतन…

* दुभंगलेल्या समाजाला एकजिन्सी करण्यासाठी संवैधानिक कायद्याचा मार्ग कसा आखून दिला.

* संवैधानिक मूल्यांना संविधानाच्या भाषेत कशी दिलेली उत्तरे…

* विविधतेने नटलेल्या देशाला बांधून ठेवण्याचे महाकठीण काम संविधानाच्या माध्यमातून कसे केले…

* भारतीय संविधान हे जीवंत दस्तऐवज आहे, हे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी कसे मांडले…

– – या सर्वाची सहज सोप्या भाषेत या पुस्तकातून मांडणी करण्यात आली आहे.

– – कार्यकर्त्यांना विषय मांडणीसाठी आणि प्रबोधनाच्या दृष्टीने अत्यंत उपयुक्त असे पुस्तक

परिचय : श्री हर्षल सुरेश भानुशाली

पालघर 

मो. 9619800030

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – पुस्तकांवर बोलू काही ☆ “इथे थांबणे नाही” – लेखक : श्री रमेश घोलप ☆ परिचय – श्री हर्षल सुरेश भानुशाली ☆

श्री हर्षल सुरेश भानुशाली

? पुस्तकावर बोलू काही ?

☆ “इथे थांबणे नाही” – लेखक : रमेश घोलप ☆ परिचय –  श्री हर्षल सुरेश भानुशाली ☆

पुस्तक : इथे थांबणे नाही 

लेखक : रमेश घोलप (भा. प्र. से.)

पृष्ठ: १३६

मूल्य : २५०₹ 

‘परमेश्वरी इच्छेवर अवलंबून न राहता जिद्द, दुर्दम्य इच्छाशक्ती आणि कठोर परिश्रम यांच्या बळावर अत्यंत प्रतिकूल परिस्थितीवर निर्धारपूर्वक मात करून आपले संकल्प सिद्ध करणारी रमेश गौरख घोलप यांची स्फूर्तिदायक यशोकहाणी आगळी वेगळी ठरते.

संघर्षात ‘रडायचं नाही लढायचं! ‘ हा त्यांचा निर्धार पक्का होतो आणि हाच निर्धार ग्रामीण भागातून पुढे येण्यासाठी धडपडणाऱ्या असंख्य तरुण-तरुणींना दीपस्तंभासारखा मार्गदर्शक ठरावा इतका महत्त्वाचा आहे.

– – पराकोटीची जिद्द आणि प्रखर आत्मविश्वास, कुठल्याही अपयशाने खचून न जाण्याची वृत्ती या आत्मकथनात ठायी ठायी दिसून येते. तरुण पिढीने आवर्जून वाचावे असेच हे पुस्तक आहे.

परिचय : श्री हर्षल सुरेश भानुशाली

पालघर 

मो. 9619800030

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – पुस्तकांवर बोलू काही ☆ “द बॉडी कीप्स द स्कोअर ” – इंग्रजी लेखक : बेसेल व्हॅन डर कोल्क – मराठी अनुवाद : दीपक देवधर ☆ परिचय – श्री हर्षल सुरेश भानुशाली ☆

श्री हर्षल सुरेश भानुशाली

? पुस्तकावर बोलू काही ?

☆ “द बॉडी कीप्स द स्कोअर ” – इंग्रजी लेखक : बेसेल व्हॅन डर कोल्क – मराठी अनुवाद : दीपक देवधर ☆ परिचय –  श्री हर्षल सुरेश भानुशाली ☆

पुस्तक : द बॉडी कीप्स द स्कोअर

 – – आघाताबद्दलचा आपला दृष्टिकोन बदलवणारे आणि नवी दिशा दाखवणारे पुस्तक

 – – मेंदू, मन आणि शरीर यांची आरोग्यातील भूमिका

लेखक : बेसेल व्हॅन डर कोल्क, एम. डी.

अनुवाद: दीपक देवधर

प्रकाशक : माय मिरर पब्लिशिंग हाऊस, पुणे 

पृष्ठ: ५१२

मूल्य: ४९९₹ 

आघात (ट्रॉमा) हा जीवनाचा वास्तव भाग आहे. युद्धाचे अनुभव, लैंगिक शोषण, व्यसनाधीन पालक, कौटुंबिक हिंसा… अशा अनेक कारणांनी माणूस आतून जखमी होतो. आघात फक्त मनावरच नाही, तर शरीर आणि मेंदूवरही खोल परिणाम करतो. त्यामुळे आनंद घेण्याची क्षमता, नातेसंबंध, आत्मनियंत्रण आणि विश्वास यावरही परिणाम होतो.

जगप्रसिद्ध आघाततज्ज्ञ आणि या पुस्तकाचे लेखक डॉ. बेसेल व्हॅन डर कोल्क यांनी तीस वर्षांहून अधिक काळ आघातग्रस्त लोकांसोबत काम केले आहे आणि त्यातून बाहेर पडण्याच्या वेगवेगळ्या उपचारपद्धती विकसित केल्या आहेत, ज्या पुस्तकाच्या माध्यमातून आपल्यासमोर मांडल्या आहेत. हे पुस्तक औषधं आणि फक्त समुपदेशन यांपलीकडे जाऊन लोकांना आपलं आयुष्य पुन्हा उभं करण्याचा मार्ग दाखवतं.

अजूनही आपण त्या सखोल ज्ञानाच्या बाबतीत खूप वर्षे मागे आहोत, पण गेल्या काही दशकांत तीन नव्या वैज्ञानिक शाखांमुळे मानसशास्त्रीय आघात, अत्याचार आणि दुर्लक्ष यांच्या परिणामांबद्दल मोठ्या प्रमाणात नवीन माहिती समोर आली आहे.

या तीन नवीन शाखा म्हणजे –

  1. न्यूरोसायन्स – मेंदू मानसिक प्रक्रियांना कशी साथ देतो याचा अभ्यास.
  2. डेव्हलपमेंटल सायकोपॅथोलॉजी मानसिक आणि मेंदूच्या विकासावर प्रतिकूल अनुभवांचा काय परिणाम होतो याचा अभ्यास.
  3. इंटरपर्सनल न्यूरोबायोलॉजी आपले वर्तन आपल्या सभोवतालच्यांच्या भावना, जैविक प्रक्रिया आणि विचारसरणीवर कसा प्रभाव टाकते याचा अभ्यास.

या नव्या शास्त्रीय शाखांमधील संशोधनाने हे दाखवून दिले आहे की, आघात, मेंदू आणि शरीरात प्रत्यक्ष जैविक बदल घडवून आणतो. यात मेंदूच्या धोक्याचा इशारा देणाऱ्या प्रणालीचे पुन्हा समायोजन होते (रिसेट होते म्हणजे लहानसहान आवाज, शब्द किंवा प्रसंगही मेंदूला मोठा धोका वाटू लागतात), तणाव निर्माण करणाऱ्या हार्मोन्सची क्रिया वाढते, आणि महत्त्वाची व महत्त्वाची नसलेली माहिती वेगळी करणाऱ्या प्रणालीत बदल होतात. आपल्याला आता माहीत झाले आहे की, मेंदूच्या ज्या क्षेत्रामध्ये आपण जिवंत असल्याची शारीरिक, मूर्त भावना व्यक्त होते, त्या क्षेत्रावर मानसिक आघाताचा परिणाम होतो. यामुळे मानसिक आघातग्रस्त व्यक्ती त्यांच्या दैनंदिन जीवनात उत्स्फूर्तपणे व्यग्र असताना मनातील धोक्याबद्दल अतिजागरूक का बनतात हे आपण समजू शकतो. यामुळे आघातग्रस्त लोकांना अनुभवातून शिकण्याऐवजी वारंवार त्याच समस्यांचा सामना का करावा लागतो हे समजून घेण्यास देखील आपल्याला मदत होते. आता आपल्या हे लक्षात आले आहे की, त्यांचे वर्तन नैतिक अपयशाच्या परिणामस्वरूप किंवा इच्छाशक्तीच्या अभावामुळे किंवा कलंकित चारित्र्यामुळे नव्हे, तर मेंदूतील वास्तविक बदलांमुळे प्रभावित होते.

आघातासंबंधीच्या मूलभूत प्रक्रियांविषयी आपण मिळवलेल्या या नव्या माहितींमुळे, या त्रासाचे निवारण करण्यासाठी किंवा काही प्रमाणात पुनर्बाधणी करण्यासाठी नवीन संधी उपलब्ध झाल्या आहेत. मेंदूची नैसर्गिक लवचीकता (न्यूरोप्लॅस्टिसिटी) वापरून आघातग्रस्त लोकांना वर्तमान क्षणात संपूर्णपणे जिवंत वाटण्यास आणि त्यांच्या जीवनात पुढे जाण्यास मदत करण्याच्या पद्धती आता विकसित करता येतात. यासाठी तीन मुख्य मार्ग आहेत.

 या पुस्तकात  

– आघातातून बाहेर येण्यासाठी न्यूरोप्लॅस्टिसिटीचा उपयोग

– ध्यान, न्यूरोफीडबॅक, खेळ आणि योग यांसारख्या उपचारपद्धती 

– आघात बरे करण्यात नात्यांची भूमिका

– शरीर आणि मेंदू यांचा परस्परसंबंध

– मन आणि मेंदू समजून घेण्यातील क्रांती

– योगसाधना, EMDR उपचार पद्धती

 

प्रभावी अनुभवकथांनी भरलेले असे हे खिळवून ठेवणारे पुस्तक. गेल्या तीस वर्षातील मानसिक आरोग्य क्षेत्रातील सर्वात महत्त्वाच्या शोधांपैकी एक आहे.

– – नॉर्मन डॉइज, ‘ द ब्रेन वॅट चेंजेस इटसेल्फ ‘ चे लेखक आहेत.

परिचय : श्री हर्षल सुरेश भानुशाली

पालघर 

मो. 9619800030

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – पुस्तकांवर बोलू काही ☆ “ घे भरारी” – लेखिका : सुश्री जुलेखा विकास शुक्ल ☆ परिचय – श्री हर्षल सुरेश भानुशाली ☆

श्री हर्षल सुरेश भानुशाली

? पुस्तकावर बोलू काही ?

☆ “घे भरारी” – लेखिका : सुश्री जुलेखा विकास शुक्ल ☆ परिचय –  श्री हर्षल सुरेश भानुशाली ☆

“ घे भरारी “ लेखिका : जुलेखा विकास शुक्ल परिचय : हर्षल भानुशाली

पुस्तक : घे भरारी

लेखक. जुलेखा विकास शुक्ल 

प्रकाशक : मधुश्री प्रकाशन 

पृष्ठ: ३२८

मूल्य: ४००₹

घे भरारी’ हा कथासंग्रह अनुभवांचा, भावनांचा आणि वास्तवाचा आविष्कार आहे. भावनांची ऊब जपताना अति हळवेपणा टाळणाऱ्या या कथा मानवी नात्यांच्या गुंतागुंतीला थेट हात घालतात. अगदी लहान-लहान क्षणांतून त्या माणसाच्या भावविश्वाला स्पर्श करतात आणि त्यामुळे वाचकाच्या मनात नकळत घर करतात.

‘घे भरारी’ या संग्रहात जोडीदार गमावल्यानंतरही आयुष्याला नवी दिशा देण्याची जिद्द दिसते. उतारवयात स्वतःकडे नव्याने पाहण्याची जाणीव उमटते आणि समाजाच्या दबावाखाली गुदमरलेला आत्मसन्मान जागा होतो. नात्यांमधील असुरक्षिततेचा ताण, फसवणुकीनंतरही स्वतःसाठी उभं राहण्याचा ठाम निर्धार, आधुनिक जगातली अस्वस्थ तरुणाई, करियर आणि नात्यांच्या कसरतीत थकलेली स्त्री आणि शिक्षणाच्या स्पर्धेत हरवत चाललेलं बालपण हे सगळं वास्तव या कथांतून समोर येतं.

‘घे भरारी’ हा मानवी नात्यांची ताकद, आत्मसन्मानाची गरज आणि आयुष्याला नवा अर्थ देण्याची क्षमता यांवरचा विश्वास आहे. या कथा दुःख सांगतात, पण निराश करत नाहीत. उलट आयुष्य कितीही कठीण असलं, तरी मार्ग नक्की सापडतोच, हा विश्वास देतात. पात्रांची वेदना, गोंधळ, करारी निर्णय आणि पुन्हा उभं राहण्याची ताकद वाचकाला गुंतवून ठेवते.

‘घे भरारी’ मधील मनाला भिडणाऱ्या, विचार करायला लावणाऱ्या आणि दीर्घकाळ सोबत राहणाऱ्या कथा वाचायच्या असतील, तर घे भरारी हा कथासंग्रह नक्कीच वाचायला हवा.

 

परिचय : श्री हर्षल सुरेश भानुशाली

पालघर 

मो. 9619800030

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – पुस्तकांवर बोलू काही ☆ “म्युझिअम” – लेखक : श्री संजय दाबके ☆ परिचय – श्री हर्षल सुरेश भानुशाली ☆

श्री हर्षल सुरेश भानुशाली

? पुस्तकावर बोलू काही ?

☆ “म्युझिअम” – लेखक : श्री संजय दाबके ☆ परिचय –  श्री हर्षल सुरेश भानुशाली ☆

पुस्तक : म्युझिअम 

लेखक : संजय दाबके 

पृष्ठ : २१२

मूल्य: ४९९₹ 

लेखक संजय दाबके यांच्या मनोगतामधून  

आपल्याला आवडणारी गोष्ट आपल्याला व्यवसाय म्हणून करायला मिळणे हा फार दुर्मिळ योग आहे, पण मी त्या बाबतीत भाग्यवान आहे. गेल्या अनेक वर्षाच्या भटकंतीत ७०/८० देशातून कधी कामाचा भाग म्हणून, कधी आवड म्हणून जवळ जवळ ७०० मोठी छोटी संग्रहालये बघून झाली. युरोप आणि भारताच्या बऱ्याच राज्यांमध्ये काही संग्रहालयांची रचना करण्याचे आणि उभारण्याचे काम हातून झाले. त्यातून एक लेखांचा संग्रह तयार झाला. हे एक प्रकारे प्रवास वर्णनच आहे. फक्त त्यात जनरल न लिहिता मला आवडलेल्या काही उत्कृष्ट संग्रहालयांबद्दल लिहिलं आहे.

संग्रहालय जर चांगलं असेल तर ती अक्षरशः एक कालकुपी असते. इजिप्तच्या अगदी देन्देरासारख्या लहानात लहान गावातल्या संग्रहालयात आपण गेलो तर, कुठले लोक तिथे हजारो वर्षांपूर्वी कसे स्थिरावले, त्यांचं जनजीवन नाईल नदीच्या साथीने कसं बहरलं याची माहिती कळते. मग आपण गावात हिंडायला जेव्हा बाहेर पडतो तेव्हा आपल्या नकळत आपण त्यांच्या चालीरीती, भाषा, संगीत याच्याकडे बारकाईने बघतो. तीच गोष्ट दुबईसारख्या अगदी लोकप्रिय शहराची. तिथे लोक जातात तेच शॉपिंगच्या उद्देशाने फार थोडे लोक जुन्या दुबईतल्या छोटेखानी दुबई संग्रहालयाला भेट देतात. १९८० पर्यंत एका अगदी गरीब खेड्यापासून आत्ताच्या झगमगणाऱ्या दुबईत एका दूरदृष्टी असलेल्या शेखच्या प्रयत्नांमुळे त्याचं कसं रूपांतर झालं याची चित्तरकथा तिथे अतिशय सुंदर स्वरूपात मांडली आहे. मग जेव्हा आपण दुबईत हिंडतो तेव्हा आपण फक्त दुबई मॉलमध्ये न जाता, जुन्या मसाला बाजारात, नदीकाठी, जुन्या मच्छी मार्केटमध्ये रेंगाळतो. लोकांची भाषा ऐकतो. स्थानिक लोक जिथे जेवतात, चहा पितात तिथे जातो. परिणामी फक्त शॉपिंग करून मिळेल त्यापेक्षा अनेक पटींनी जास्त समाधान आपण परत येताना आपल्याबरोबर घेऊन येतो. कारण तो देश थोडा फार तरी आपल्याला समजलेला असतो आणि याच मुख्य कारण असतं आपण पाहिलेलं एक सुंदर संग्रहालय!

युरोप तर संग्रहालय शास्त्रामध्ये आद्य! तिथे इतिहास प्रचंड. फारशी आक्रमणे न झाल्यामुळे (दुसऱ्या महायुद्धाचा मात्र अपवाद) खूपसा भूगोल अजूनही शेकडो नाही तर हजारो वर्षांच्या खुणा अंगावर मिरवतोय. सोळाव्या शतकापासून जगभरच्या वसाहतींमुळे झालेली आर्थिक भरभराट आणि या सगळ्यामुळे आपला इतिहास आणि संस्कृती जिवापाड जपायची आपोआप अंगात निर्माण झालेली वृत्ती यामुळे युरोपातल्या बहुतेक देशात अप्रतिम संग्रहालये बघायला मिळतात. त्यात इंग्रज अग्रस्थानी. गेली ३० वर्षे मी सातत्याने इंग्लंडला जातोय, तिथे दीर्घकाळ राहिलोय पण अजूनही माझी इंग्लंडमधलीच काय पण राजधानी लंडनमधली सगळी संग्रहालये बघून झाली नाहीयेत.

ऐतिहासिक घरांपासून (शेक्सपिअर ते शेरलॉक होम्स) ते प्रचंड ऐतिहासिक संग्रहालयांपर्यंत (ब्रिटिश म्युझिअम, व्हिकटोरिया आणि अल्बर्ट म्युझिअम) फक्त अचंबित व्हावं इतका इतिहास जपलाय या लोकांनी!

पोलंडला गेलं तर ऑश्वित्झ इथल्या दुसऱ्या महायुद्धातल्या छळ छावणीचं मन सुन्न करणारं आता केलेलं संग्रहालयातलं रूपांतर. जगात खूप बघण्यासारखं आहे पण त्याची सुरूवात त्या त्या ठिकाणच्या संग्रहालयांपासून होते ही माझी तरी आता ठाम समजूत झाली आहे.

माझ्या जगभरच्या भ्रमंतीत आत्तापर्यंत अनेक उत्तमोत्तम, काही भव्य तर काही अगदी एका खोलीत मांडलेल्या, काही ड्रेस्डेनमधल्या ग्रीन व्हॉल्टसारख्या अगदी अनपेक्षित अनुभव देणाऱ्या अनेक संग्रहालयांपर्यंत मी जाऊ शकलो. माझ्यासारखे इतिहासप्रेमी, पर्यटन म्हणजे फक्त खरेदी असं न मानणारे खूप असतील पण, कदाचित त्यांच्याकडे वेळ थोडा असेल, अशांसाठी माझ्या प्रवासातून एकत्रित केलेले काही निवडक संग्रहालयांचे अनुभव ह्या पुस्तकात मांडण्याचा प्रयत्न केला आहे. काही जणांना तरी याचा उपयोग व्हावा अशी इच्छा!

*************

या पुस्तकात  

— ४०-४५ किमी पसरलेलंसुद्धा एक संग्रहालय असू शकतं?

— नेपोलियनची शवपेटी असलेलं म्युझिअम कोठे आहे?

— वेश्याव्यवसायावर आधारितसुद्धा एक संग्रहालय आहे?

— टायटॅनिक जहाजाला अफाट प्रसिद्धी का मिळाली?

— दरवर्षी ३० लाख पर्यटक भेट देतात ते ठिकाण कोणतं?

— शेक्सपिअरच्या घरामध्ये त्याच्या कोणत्या गोष्टी जतन करण्यात आल्या आहेत?

— कोणत्या म्युझिअमवरून माणूस हजारो रुपयांचे खरेदी करून जातो?

— नशीब ठरवणारा दगड’ कोठे जतन केला आहे?

— कसं तयार झालं मिठाच्या खाणीचं म्युझिअम?

… युरोप खंडातील १३ अद्भुत म्युझिअम्स, तेथील रोमांचक वर्णने, अनाकलनीय सत्ये, ऐतिहासिक वारसा प्रभावीपणे सांगणारं हे पुस्तक खूप वाचनीय आहे.

 

परिचय : श्री हर्षल सुरेश भानुशाली

पालघर 

मो. 9619800030

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – पुस्तकांवर बोलू काही ☆ “विचारचक्रांचा योग्य उपयोग” – लेखक : अब्राहम थॉमस – अनुवाद : स्नेहा केणी☆ परिचय –  श्री हर्षल सुरेश भानुशाली ☆

श्री हर्षल सुरेश भानुशाली

? पुस्तकावर बोलू काही ?

☆ “विचारचक्रांचा योग्य उपयोग” – लेखक : अब्राहम थॉमस – अनुवाद : स्नेहा केणी☆ परिचय –  श्री हर्षल सुरेश भानुशाली ☆

पुस्तक : विचारचक्रांचा योग्य उपयोग 

 – – – मनावर प्रभावीपणे ताबा मिळवा

लेखक : अब्राहम थॉमस

अनुवाद : स्नेहा केणी

मूल्य: ३३०₹ 

रोजच्या धकाधकीच्या जीवनाने भांबावून न गेलेली व्यक्ती सापडणे जणू अशक्यच आहे. मनात सतत गोंधळ सुरू असतो… त्यामुळे आपण नेहमी दुख, राग आणि वैतागाच्या दुष्टचक्रात अडकलेलो असतो… मग अशा परिस्थितीत मदतीसाठी पाहावे तरी कोणाकडे? याचं उत्तर आपल्यातच दडले आहे. हे पुस्तक प्रभावी मन नियंत्रणाद्वारे पुढे जाण्याचे व्यवहार्य आणि शाश्वत मार्ग सुचवते.

– – रागावर नियंत्रण कसे ठेवावे. संयम कसा वाढवावा. दुःखाला कसे सामोरे जावे. अपराधीपणाचा सामना कसा करावा. अचानक आलेल्या निराशेच्या खोल गर्तेतून कसे बाहेर पडावे. समाधानी आयुष्य कसे जगावे. जीवन अर्थशून्य भासत असल्यास, या निराशापूर्ण भावनेला कसे टाळावे. हे पुस्तक ‘इफेक्टिव माईंड कंट्रोल’ या संकेतस्थळावरील मनासंबंधीच्या ए. आय. (कृत्रिम बुद्धिमत्ता) प्रबंधातील वर्तनात्मक पैलूंचा संक्षिप्त आढावा घेते. ईएमसी या संकेतस्थळाला जगभरातून भरघोस प्रतिसाद लाभला. १५० देशांतील सुमारे पाच लाखांहून अधिक लोकांनी या वेबसाईटला भेट दिली. इएमसी असे गृहीत धरते की आय. ए. (अंतर्ज्ञानाची नियतरीती) मुळे मनाला विगमक तर्क वापरून वृत्ती आणि वर्तन नियंत्रित करता येते.

– – हे पुस्तक शतकानुशतके ज्ञानी व्यक्तींनी आचरणात आणलेल्या साध्या सोप्या मानसिक व शारीरिक सरावांची शिफारस करते. यामुळे आपला दृष्टिकोन व कृती बदलण्यास मदत होते आणि आपण आयुष्याचे सकारात्मक अनुभव घ्यायला शिकतो.

 

परिचय : श्री हर्षल सुरेश भानुशाली

पालघर 

मो. 9619800030

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – पुस्तकांवर बोलू काही ☆ सैतान…  लेखक : श्री नारायण धारप ☆ परिचय – सुश्री तृप्ती कुलकर्णी ☆

सुश्री तृप्ती कुलकर्णी

?पुस्तकावर बोलू काही ?

☆ सैतान…  लेखक : श्री नारायण धारप ☆ परिचय – सुश्री तृप्ती कुलकर्णी ☆

पुस्तक : सैतान 

लेखक : नारायण धारप

प्रकाशक : साकेत प्रकाशन

नारायण धारप म्हणजे भयकथांचे अनभिषिक्त सम्राट असं म्हटलं जायचं ते का याचं उत्तर मला नारायण धारपांची पुस्तकं वाचल्यावर मिळालं. खरंतर भयकथा हा मी आवर्जून वाचण्याचा साहित्यप्रकार नाही. पण वाचनामध्ये नावीन्यपणा आणण्यासाठी किंवा वाचनाची गोडी टिकवण्यासाठी म्हणून हा साहित्यप्रकार वाचायला मी सुरुवात केली. असं असलं तरी नारायण धारपांच्या पुस्तकांच्या मुखपृष्ठांनी मात्र अनेक वर्षांपासून माझं लक्ष वेधून घेतलं होतं. बऱ्याचदा मुखपृष्ठ बघूनच आपल्याला आतला मजकूर फारसा भावणार नाही असं वाटून मी ती पुस्तकं वाचण्याचं आवर्जून टाळलं होतं.

आता वाचायला सुरुवात केल्यावर लक्षात आलं की मुखपृष्ठं भयानक असली तरी आतला मजकूर मात्र केवळ भय भावनाच सांगत नाही. धारपांच्या पुस्तकांमध्ये सगळ्यात जाणवणारी गोष्ट म्हणजे मती गुंग होणे. भयकथांचं महत्त्व केव्हा वाढतं तर तुम्हाला त्या भयामागचं कारणच समजत नाही तेव्हा. पण इथे कारण समजलं असलं तरी त्याचा जो भयावह परीणाम होतो किंवा त्या कथेतून आपल्याला वाचायला मिळतो त्याने जास्त भय वाटत राहते.

‘सैतान’ या मी वाचलेल्या कादंबरीबाबत बोलायचं झालं तर कथानक साधं घेतलं आहे. पुण्याजवळच्या एका गावात तीनवाडीमध्ये एका खडकाळ डोंगराळ निर्मनुष्य वस्तीवर विमान कोसळतं. आणि सबंध विमान पेट घेऊन त्यातील एकही व्यक्ती जिवंत राहत नाही. सर्वच्या सर्व मृत पावतात. आणि या दुर्घटनेच्या प्रसंगानंतर त्या तीनवडी गावावर जे संकट बेततं त्याची ही कथा. कोणत्याही प्रकारची कल्पना नसताना ध्यानीमनी नसलेला मृत्यू स्वीकारणं हे शरीराला जरी अपरिहार्य असलं तरी मानवी वासना भावना यांना ते सहज शक्य होत नाही. आणि या मृतात्म्यांच्या आक्रोशातून स्वतःला जिवंत ठेवण्याच्या धडपडीतून निर्माण झालेल्या वासनांतून पुढे घडणाऱ्या गोष्टी म्हणजे हे कथानक.

प्रसंगांचं तपशीलवार वर्णन आणि अचूक शब्द योजना हे नारायण धारपांच वैशिष्ट्य यातून दिसून येतं. म्हणजे रहस्य कथा असो किंवा भयकथा असो शब्दयोजना प्रचंड महत्त्वाची असते. आणि तिच वाचकाच्या मनावर पकड घालू शकते. अनेकदा प्रसंग खूप रहस्यमय नसतील तरी चालेल पण त्यांची मांडणी आणि त्यातले शब्द हेच वाचकाच्या मनावरती प्रभाव टाकतात आणि यामध्ये धारपांचा हातखंडा जाणवतोच.

आणखीन एक त्यांच्या लेखनाचे वैशिष्ट्य जाणवलं ते म्हणजे एक सलग कथानक घेऊन सरळसोटपणे लेखन ते करत नाहीत. त्यांच्या कथांमध्ये वेगवेगळ्या प्रकारची उपकथानकं असतात. आणि त्या उपकथानकांचा एकमेकांशी संबंध असतो तो वाचकाला समजून घ्यावा लागतो. म्हणजे धारपांच पुस्तक वाचताना वाचक म्हणून लागलेली आपली तंद्री फार महत्त्वाची असते. नाहीतर आपल्याला उपकथानकातला मूळ कथेशी असलेला धागा पटकन समजू शकत नाही. कारण प्रत्येक उपकथनकात एखाद्या घटनेचा धागा जरी समान असला तरी पात्रांची नावे, परिस्थिती, वर्णन त्यांची कामं ही पूर्णपणे वेगळी असतात. एक विमान कोसळून पडणं या एका घटनेचा संबंध पुजारी, पादरीबुवा, फोटोग्राफर, आर्मी मधले रिटायर्ड ऑफिसर, गावातील गुंड प्रवृत्तीची माणसं आणि ती घटना पाहण्यासाठी जमलेली एक लहान मुलगी या सगळ्यांवर किती वेगवेगळ्या प्रकारे होतो आणि ते त्याला कसे सामोरे जातात त्याचं अत्यंत प्रत्ययकारी वर्णन यात आलं आहे.

काही प्रसंगात ती बाहुली जेव्हा चालत येते तेव्हा तिचं वर्णन, नंतर खसखस हसण्याच्या आवाजाचे वर्णन हे वाचताना अंगावर अक्षरशः काटा येतो. त्यांचं कथानक वाचताना आपली तर्कनिष्ठा बाजूला ठेवावी लागते असं न म्हणता मी तर उलट म्हणेन आपल्या तर्कनिष्ठेला आव्हान देणारं कथानक ते लिहितात. आणि त्यामुळे त्यांचं लेखन परिणाम करतं. ‌

विमान अपघात या एका दुर्दैवी घटनेचे वेगवेगळ्या मनोवृत्तीच्या लोकांवर कसे परिणाम होऊ शकतात हे दाखवणं सोपं नाही. पण ते कसब यात सहज साधलं गेल्यामुळे कथानक जास्त रोचक होत जातं.

सैतानी वृत्तीची शक्ती आणि सामान्य व सज्जन शक्ती या दोघांमधला संघर्ष हा अनादी काळापासून चालत आलेला आहे. आणि तोच संघर्ष अनेक मानवी मूल्य जिवंत ठेवतो आणि त्याचबरोबर त्या मूल्यांची होणारी पायमल्लीसुद्धा दाखवतो. हा जो प्रचंड विरोधाभास आपल्या जगण्यामध्ये आहे. तो फार उत्तमरीत्या ते मांडतात आणि त्याने त्या कथानकावरती विश्वास ठेवावासा वाटतो.

माणसांच्या मनोवृत्तीचं अचूक निरीक्षण, भरपूर अभ्यास आणि अनेक तांत्रिक गोष्टींचाही अभ्यास, स्थळ काळानुसार माणसाच्या जीवन पद्धतीत होत गेलेले बदल टिपणे अशी कितीतरी वैशिष्ट्ये त्यांच्या लेखनात दिसून येतात. त्यामुळे फक्त भय या नावातच माझ्याप्रमाणे जर कोणी अडकलं असेल तर त्यांनी तो एकांगी दृष्टिकोन न ठेवता एका वेगळ्या दृष्टिकोनातून हे पुस्तक जर वाचलं तर त्यांना निश्चितच काहीतरी वेगळं वाचल्याचा अनुभव मिळेल.

परिचय – तृप्ती कुलकर्णी

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – पुस्तकांवर बोलू काही ☆ “अरुणोदय” – लेखिका : श्री भावेश ब्राह्मणकर ☆ परिचय – श्री हर्षल सुरेश भानुशाली ☆

श्री हर्षल सुरेश भानुशाली

? पुस्तकावर बोलू काही ?

☆ “अरुणोदय” – लेखिका : श्री भावेश ब्राह्मणकर ☆ परिचय –  श्री हर्षल सुरेश भानुशाली ☆

पुस्तक : अरुणोदय.

लेखक: भावेश ब्राह्मणकर

पृष्ठ: २७६

फ्री होम शिपिंग

कुसुमाग्रज प्रतिष्ठानच्या वतीने देण्यात आलेल्या अभ्यासवृत्तीद्वारे साकारलेले अरुणोदय पुस्तक अरुणाचल प्रदेशातील भारत-चीन सीमेवर कार्यरत असलेल्या भारतीय सैन्याच्या खडतर कार्यावर आणि संघर्षावर प्रकाश टाकते. श्री. ब्राह्मणकर यांनी स्वतः प्रत्यक्ष सीमेवर जाऊन या कादंबरीचे लेखन केले असून, यात ‘अरुण’ नावाच्या जवानाचा चित्तथरारक जीवनपट उलगडण्यात आला आहे. एका पत्रकाराने प्रत्यक्ष सीमेवरील अनुभवातून सैनिकांच्या त्यागाची ही शौर्यगाथा मांडणे ही अत्यंत कौतुकास्पद बाब आहे.

व्हाईस ॲडमिरल सुनील भोकरे (निवृत्त) (अतिविशिष्ट सेवा मेडल, युद्ध सेवा मेडल, नौसेना मेडल) आपल्या प्रस्तावनेत म्हणतात – – 

– – अरुणाचल प्रदेशातील भारत-चीन सीमा हा विषय सद्यस्थितीत भारताच्या राष्ट्रीय सुरक्षेच्या आणि भौगोलिक राजकारणाच्या दृष्टीने अत्यंत कळीचा आहे. मुळातच अशा प्रकारचा आव्हानात्मक विषय लेखक स्वीकारत नाहीत. मात्र लेखकाने तो स्वीकारल्याने मला मनापासून आनंद झाला. या शिष्यवृत्तीसाठी मी त्यांना शिफारसपत्रही दिले होते. अरुणाचल प्रदेशात प्रत्यक्ष राहून लेखकाने सैन्याचे कामकाज जाणून घेतले. तेथील वातावरण, भौगोलिक स्थिती पाहिली. तेच त्यांच्या लेखनात उतरले आहे. संरक्षण मंत्रालयाचा प्रतिष्ठित डिफेन्स करस्पॉन्डन्स कोर्स केला असल्याने लेखकाला अरुणाचल प्रदेशातील परिस्थितीचा अंदाज आलेला दिसतो. अरुणाचल प्रदेशातील सीमा प्रदेश हा विषय तसा मराठी लेखकांसाठी अतिशय दुर्मिळच म्हणावा लागेल. त्या भागावर फारसे लेखन मराठीमध्ये होत नसल्याचे निरीक्षण अनेकांनी मला सांगितले आहे. तोच विषय घेऊन ‘अरुणोदय’ ही कादंबरी लेखकाने लिहिल्याने ही बाब मराठी साहित्याच्या दृष्टीनेही मला महत्त्वाची वाटते.

भारतीय सैन्य किती खडतर परिस्थितीमध्ये राहते, कामकाज करते, शत्रूबरोबरच देशांतर्गत, भौगोलिक, पर्यावरणीय किती आव्हाने त्यांच्यासमोर आहेत हे सारे लेखकाने चपखलपणे मांडले आहे. अशा प्रकारचे लेखन होणे गरजेचे आहे. यामुळे सैन्याच्या कामकाजाबरोबरच अन्य स्वरूपाची माहितीही वाचकांपर्यंत पोहोचते. अरुण या जवानाची कथा सांगतानाच लेखकाने त्याच्या जीवनातील भावनिक, मानसिक, कौटुंबिक पैलू अचूकपणे उलगडले आहेत. त्याशिवाय ग्रामीण जीवनाचे विविध पदरही उत्तमरीत्या शब्दबद्ध केले आहेत. छोट्या छोट्या प्रसंगांमधून त्यांनी सैन्यातील खडतर परिस्थिती वाचकांसमोर ठेवली आहे. आजच्या काळाशी सुसंगत असे लेखन आणि कादंबरी लिहून लेखकाने मराठी साहित्यात मोलाची भर घातली असावी, असे मनोमन वाटते.

लेखकाला मी २०१५ पासून वैयक्तिक व व्यावसायिकरीत्या ओळखतो. पत्रकारिता क्षेत्रात दीर्घकाळापासून कार्यरत असताना सातत्याने उल्लेखनीय आणि मोलाचे योगदान लेखक देत आहे. अत्यंत कष्टाळू पत्रकाराबरोबच लेखकाची आकलनशक्ती तसेच विश्लेषणात्मक विचारपद्धती वाखाणण्याजोगी आहे. विशेषतः पर्यावरण आणि संरक्षण यांसारख्या अत्यंत संवेदनशील व तांत्रिक विषयांवर सातत्याने सखोल लेखन करण्याची हातोटी लेखकात आहे.

‘कुसुमाग्रज शिष्यवृत्ती’ च्या निमित्ताने अरुणाचल प्रदेशातील भारत-चीन सीमा आणि भारतीय लष्कराचे कामकाज यावरील अप्रतिम लेखन वाचकांपुढे येत आहे. त्याचे सर्वांनी स्वागत करायला हवे असे मला वाटते. कादंबरीचा नायक असलेल्या अरुणची पत्नी त्याच्या शोधार्थ सीमाभागात जाते. मात्र, सैन्यशिस्तीच्या ते विरुद्ध आहे हे सुद्धा अचूकपणे लेखकाने पुस्तकात मांडले आहे. सैन्यातील कामकाजाचे बरेच बारकावे लेखनात आल्याने हे पुस्तक वास्तवाच्या समीप जाणारे आहे. केवळ युद्ध किंवा संघर्ष यावर होणारे लेखन आणि शांतता काळातील लेखन यात कमालीचा फरक आहे. भारतीय सैन्य हे अनेक आघाड्यांवर लढत असते. त्याची विस्तृत माहिती या पुस्तकाच्या रूपाने वाचकांना होईल, असे वाटते. सैन्यात गुणवत्तेला किती किंमत आहे आणि प्रत्येकाने आपापली जबाबदारी किती सक्षमपणे सांभाळली पाहिजे, याचेही दर्शन या पुस्तकात होते. हे पुस्तक म्हणजे अभ्यासपूर्ण प्रबंधच आहे. भारतीय सैन्य, त्याचे कामकाज, अरुणाचल प्रदेशातील सीमा या सर्व विषयांकडे पाहण्याचा एक नवीन आणि व्यापक दृष्टिकोनही वाचकांसमोर आला आहे. वाचकांना नक्कीच हे पुस्तक आणि त्यातील लेखन आवडेल, अशी मला ठाम खात्री आहे.

पुस्तकाबद्दल प्रतिक्रिया  

हे पुस्तक सर्वार्थाने अद्वितीय आहे. ते भारतीय लष्कराचे सार नेमकेपणाने मांडते. राष्ट्रीय सुरक्षेसारखा गंभीर विषय रोमँटिक कथेच्या स्वरूपात मांडून लेखकाने कमालच केली आहे. हे पुस्तक एकदा वाचायला सुरुवात केल्यावर खाली न ठेवता येण्यासारखे आहे. ते प्रत्येक भारतीयाने वाचलेच पाहिजे.

– कर्नल विनायक भट (सेवानिवृत्त)

पत्रकारितेतील ‘वस्तुनिष्ठता’ व साहित्यातील ‘सर्जनशीलता’ यांचा अनोखा अनुबंध भावेश ब्राह्मणकरांच्या या कादंबरीत आढळतो. अरुण देशकर या भारतीय लष्करातील जवानाची कहाणी वाचकाला खिळवून टाकते. यानिमित्ताने ‘अरुणाचल’ या निन्तातसुंदर प्रदेशातील खडतर जीवनाची झलकही वाचकाला मिळते.

– प्रा. हर्षवर्धन कडेपूरकर

परिचय : श्री हर्षल सुरेश भानुशाली

पालघर 

मो. 9619800030

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares