मराठी साहित्य – पुस्तकांवर बोलू काही ☆ ‘आतला आनंद’ – शांताबाई शेळके ☆ सुश्री संगीता कुलकर्णी

कवयित्री शांताबाई शेळके विशेषांक

सुश्री संगीता कुलकर्णी

? पुस्तकावर बोलू काही ?

 ☆ ‘आतला आनंद’ – शांताबाई शेळके ☆ सुश्री संगीता कुलकर्णी ☆ 

पुस्तकाचे नाव: आतला आनंद (ललित लेखसंग्रह )

लेखिका:            शांता शेळके

पृष्ठ संख्या:         112

किंमत:               120 रुपये.

जानेवारी ते डिसेंबर २००१ या काळात शांताबाई शेळके यांनी दै.सकाळ या वर्तमानपत्रातील  “दिपमाळ” या सदरात आठवड्याला एक असे ५२ ललित लेख लिहिले त्यांचा हा संग्रह तो म्हणजेच ” आतला आनंद ” हा होय..

शांताबाईंच्या सहज सुंदर प्रसन्न शैलीतील हे ललित लेख..अवती भवतीच्या व्यक्तिमत्वांचा आणि घटनांचा रोचक वेध.. ह्या सदरासाठी लेखन करताना प्रत्येक वेळी काय लिहायचं?किंवा रोज काय लिहिणार? हे त्यांनाही ठाऊक नसायचं. ऐन-वेळी वेगवेगळे विषय त्यांना सुचत आणि त्या लिहीत. हे सर्व लिहीत असताना आपल्या स्मृतिसंपुटात काय काय साठवलेलं असतं याची विस्मयकारक प्रचिती त्यांना हे लेख लिहिताना आली जणू काही नव्यानेच स्वतःची ओळख त्यांना पटत गेली. त्यांच्या निधनानंतर आठ वर्षांनी प्रकाशित झालेला हा ललित संग्रह..या लेखात त्यांनी उपरोक्त विचार मांडले आहेत..

प्राचीन विचारवंतांनी कामाइतकाच क्रोधालाही रिपू मानून त्यावर विजय मिळवावा असे सांगितले आहे. अगदी साध्या व्यावहारिक दृष्टिकोनातूनही एकूण रागावणे, चिडणे, संतापणे योग्य नाही असे आपण मानतो. खूप संताप आला तर शंभर अंक मोजावेत हा संकेतही आपल्याला ठाऊक आहे. क्रोध जिंकावा असे जे तात्विक आध्यात्मिक भूमिकेतून म्हटलेले आहे ते योग्यच आहे.  एकूण काय रागावणे ही गोष्ट टाळायला हवी याबद्दल कुणाचेच दुमत होण्याचे कारण नाही. पण लगेचच दुसरा एक विचार मनात येतो की राग ही गोष्ट खरोखरचं इतकी वाईट आहे का? असा विचार करायला लावणारा हा लेख ” शत्रू की मित्र” या लेखात आपल्याला वाचायला मिळतो.

 आधार आपल्या जीवनातील एक अत्यावश्यक गोष्ट. जिवंत माणसांतच नव्हे तर भोवतालच्या परिसरात, ओळखीच्या ह्रदयात, अगदी निर्जीव वस्तूंमध्ये देखील आपण आधार शोधत असतो. ” आधार ” हा लेख थोड्या फार प्रमाणात असाच आहे.

” विस्मृतीचे वरदान” हा लेख वास्तवाचे भान देणारा.. या लेखात रवींद्रनाथ टागोरांचे एक सुंदर व अर्थपूर्ण विधान ते म्हणजे भूतकाळातल्या स्मृती जिवंत ठेवण्याच्या माणसाच्या धडपडीला बघून काळ हसत असतो. काळाचे चक्र अविरत फिरत असते आणि दैनंदिन जगण्याचा रेटा इतका जबरदस्त असतो की भूतकाळातल्या स्मृतींना उराशी घट्ट कवटाळून ठेवणे कितीही हवेहवेसे वाटले तरी तसे करता येत नाही..स्मृती नव्हे तर विस्मृती हेच जीवनातले वास्तव आहे. याची आपल्याला जाणीव होते..किती अर्थपूर्ण विधान आहे हे…

 तर कधी बंगालमधल्या आकांक्षारहित जीवन जगणा-या बाऊल जमातीची माहिती वाचकाला देतात तर कधी चंद्रा नावाच्या अनपढ गवळणीची मार्मिक लेख वाचायला मिळतो तसेच ” असा एक शिवराम” नावाची सत्यकथाही मनाला चटका लावून जाते.तर कधी स्वतःच्या आयुष्यातला एखादा हृदयस्पर्शी प्रसंग कथन करतात. झेन कथा, पाटलाच्या गड्याची सून, ती जूनी नाती, नानी, पाखरे, खेळ इ. शीर्षकांतर्गत येणारं बाईचं अनुभव कथन  सहज लक्षात राहण्यासारखे आहे..

यातील लेख वाचकांशी उत्तम संवाद साधतात.  मानवी जीवनातले नेहमीचेच अनुभव वाचकांच्या मनात विचारचक्र सुरू करतात व त्याला अंर्तमुख करतात.. करायला भाग पाडतात.. स्वतःच्या मर्मबंधातली ही ठेव सोप्या सहज भाषेत त्यांनी कथित केली आहे. हे सदर संपवीत वाचकांचा निरोप घेताना त्या म्हणतात ” असे कधी तरी काही निमित्ताने फिरून भेटूया..आतला आनंद परस्परांत वाटू या..”

©  सुश्री संगीता कुलकर्णी 

लेखिका /कवयित्री

ठाणे

9870451020

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – पुस्तकांवर बोलू काही ☆ ‘पाण्यावरल्या पाकळ्या’ – शांताबाई शेळके ☆ सौ. राधिका भांडारकर

कवयित्री शांताबाई शेळके विशेषांक

सौ. राधिका भांडारकर

? पुस्तकावर बोलू काही ?

 ☆ पुस्तकांवर बोलू काही ☆ ‘पाण्यावरल्या पाकळ्या’ – शांताबाई शेळके ☆ सौ. राधिका भांडारकर ☆ 

पुस्तकाचे नाव: पाण्यावरल्या पाकळ्या

प्रकाशक:        गुलाबराव मारुतीराव कारले

प. आवृत्ती:      १४सप्टेंबर १९९२

किंमत:            पन्नास रुपये.

सहा जुन हा  शान्ता शेळके यांचा स्मृतीदिन.त्या निमीत्ताने…

शांता शेळके म्हणजे मराठी साहित्यातलं महान व्यक्तीमत्व.कवियत्री ही त्यांची प्रतिमा असली तरी,कथा कादंबरी ललीतलेखन,सदरलेखन या साहित्यप्रकारातही त्यांचं दर्जेदार योगदान आहे.मेघदूताचा मराठी अनुवाद त्यांनी केला.आनंदाचे झाड,वडीलधारी माणसे सारखं

गद्यलेखनही त्यांनी केलं. त्यांची जवळ जवळ पाचशेच्यावर गीते आहेत. जीवलगा राहिले दूर घर माझे,

मागे उभा मंगेश, आमी डोलकं रं, ही वाट दूर जाते.. अशी अनेक गीतं रसिकांना मुग्ध करतात. रविकिरण मंडळाचा तो काळ. आणि शांताबाईंचं उपजत असलेलं कवीमन.. यांचा ऊत्तम मेळ जमला. वर्षा हा त्यांचा पहिला काव्यसंग्रह…

पाण्यावरील पाकळ्या हा जपानी हायकूंचा अनुवादित काव्यसंग्रह. शिरीष पै, सुरेश मथुरे यांनी जपानी हायकूंचे अनुवाद केले .स्वंतत्र हायकूही लिहीले.शांताबाईंचा अशाप्रकारचा हा पहिलाच काव्यसंग्रह.

हायकू हा एक रचनाबंध आहे. हायकूचे विशेष म्हणजे बंदीस्त रचनेतलं भावदर्शनांचं स्वरुप. एखादा धावता गतीमान क्षण पकडून नेमका शब्दांकीत करणे. हे हायकूचं

बलस्थान.

हायकूला एक आकृतीबंध आहे. नियम आहेत. मात्र प्रस्तुत पुस्तकात जपानी हायकूंचा मुक्त अनुवाद आहे.

त्यांनी या हायकूंना स्वत:ची काही परिमाणे देऊन मराठी प्रवाहात आणल्यामुळे हे अनुवादित हायकू आपल्या भावनांशी जुळतात.

प्रस्तावनेत शांताबाईंनी, त्यांना ज्ञानदेवांच्या काव्यातही हायकूशी साधर्म्य जाणवल्याचे म्हटले आहे.

कमळावरी भ्रमर

पाय ठेविती हळुवार

कुचंबेल केसर।ईया शंका।।..

असे असले तरीही जपानी हायकूला एक स्वतंत्र व्यक्तीमत्व आहे. त्यांत निसर्गाची ओढ, जीवनचिंतन, अल्पाक्षरीत्व, चित्रदर्शीत्व यांचा समावेश आहे.

आणि याचा सुरेख आनंददायी अनुभव रसिकांना शांताबाईंनी या हायकूतुन दिला आहे… हायकुच्या काव्यात्म आशयाशी त्या प्रामाणिक राहिल्या  आहेत.

बर्फाळ टेकड्यावरुन

चाललेले माझे एकाकी भ्रमण

साथ देतो एकटा कावळा दुरून…

 

एक डबके  जुनाट संथ

बेडुक मारतो उडी

पाणी खळबळून पुन्हा निवांत….

हायकूंमधे प्राण्यांना मानवी जीवनात दिलेलं रुपकात्मक स्थान, एक सरळ तत्व हलकेच सांगून जातं.

शिशीराने निष्पर्ण केलेल्या रानात

वारे ओरडत आहेत रागारागाने

त्यांना उडवायला राहिली नाहीत पाने..

किंवा,

हिवाळी वार्‍यांने जेव्हां विखुरल्या

पिओनींच्या फुलांच्या पाकळ्या

काही जोडीने खाली उतरल्या….

खडकातून प्रचंड झेपा घेत

नदी धावते आहे रागाने रोरावत

जवळचा पर्वत मात्र शांत सस्मित….

इतक्या अल्पाक्षरांतून निसर्गाचे भव्य दर्शन तर होतेच पण जीवनातले आध्यात्मही झिरपते..

या अनुवादित हायकूंबद्दल शांताबाई म्हणतात, या काव्यप्रकारातील काव्यगुणांचे त्यांना आकर्षण वाटले.

गवताच्या पात्यावर दवाचे थेंब आकाराला यावेत तसे मनाच्या पात्यावर जमलेल्या विशिष्ट भावानुभवाचे थेंब म्हणजे हायकू.

त्यांनी मूळ जपानी हायकूच्या इंग्रजी अनुवादांचे मराठी अनुवाद केले. त्याविषयी त्या म्हणतात “हायकूच्या तांत्रिक अंगाचे मला ज्ञान नाही. तिच्या रचनेची बंदीश, नेमकी शब्दसंख्या मला ठाउक नाही.मात्र रुपवतीचे सौंदर्य, बांबूच्या जाळीदार पडद्यावर बघावी त्याप्रमाणे हायकुचे सौंदर्य मी इंग्रजी अनुवादातून अनुभवले.”

म्हणून या पुस्तकातील हायकूची रचना मुक्त ठेवली आहे. काही अनुवाद छंदोबद्ध आहेत, काही गद्यसदृश आहेत तर काही चार ओळींचेही आहेत.

जसे की,

  जळावरी हिमखंड गोठले

  आज कसे वितळती

  मिटवून भांडण एकदिलाने

  झुळुझुळु वाहती!!

या पुस्तकात जवळजवळ २५४ हायकू आहेत.

त्यांत निसर्ग तर आहेच. प्राणीपक्षीही आहेत. फुले आहेत, झाडे आहेत. पंचमहाभूतांचाच अविष्कार आहे.

शिवाय मानवी मनाचे मनोव्यापारही आहेत. भावभावनांची अंदोलने आहेत. जरी हे जपानी हायकू असले तरी ते कुठेतरी मानवी संस्कृतीशी एकात्म आहेत.आणि शांताबाईंच्या शब्दांची रुणझुण इतकी मंजुळ आहे की हे सारं काव्य हळुवारपणे मनाच्या गाभार्‍यात तरंगत जातं, जसं की पाण्यावर

फुलांच्या पाकळ्या अलगद तरंगतात… एका वेगळ्याच काव्यप्रकाराचा, काव्यानंद या पुस्तकातून मिळतो…  शांताबाईंच्या संवेदनशीलतेला, कवीमनाला, शब्दमाधुर्याला

मनापासून सलाम…

 

© सौ. राधिका भांडारकर

पुणे

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – पुस्तकांवर बोलू काही ☆ मला निसटलचं पाहिजे ☆ सुश्री संगीता कुलकर्णी

सुश्री संगीता कुलकर्णी

? पुस्तकावर बोलू काही ?

 ☆ पुस्तकांवर बोलू काही ☆ मला निसटलचं पाहिजे ☆ सुश्री संगीता कुलकर्णी ☆ 

पुस्तकाचे नाव— मला निसटलचं पाहिजे

निवेदन— स्लाव्होमिर रावीझ

शब्दांकन— रोनाल्ड डाऊनिंग

अनुवाद—- श्रीकांत लागू

ऑनलाइन उपलब्ध ->> मला निसटलचं पाहिजे

“मला निसटलचं पाहिजे” या पुस्तकात सपशेल खोटी वाटावी अशा ख-या साहसकथेचा अनुभव घेता येतो. पुस्तकाचे निवेदन स्लाव्होमिर रावीझ यांनी केले असून  रोनाल्ड डाऊनिंग यांचे शब्दांकन वाचण्यास मिळते. मात्र श्रीकांत लागू यांनी तेवढ्याच ताकदीने पुस्तकाचा केलेला अनुवाद आपल्या शैलीत साकारला आहे.

रशियातील स्टॅलिनच्या अत्यंत जुलमी राजवटीचा तो काळ. या काळात तेथील नागरीकांवर अनन्वित अत्याचार झाले. या जुलमी राजवटीच्या काळात कामधंद्यानिमित्ताने रशियात राहिलेल्या नागरीकांवरही अनन्वित अत्याचार झाले. यात निरपराध युद्धकैदीही होते. त्यांची सपशेल खोटी वाटावी पण खरी अशी ही साहसकथा अंगावर शहारा आणणारी तर आहेच पण त्यावेळी त्यांना  प्रत्यक्ष काय काय यातनांचा मुकाबला करावा लागला हे चित्रच डोळ्यासमोर उभे राहते. अश्या जीवघेण्या प्रसंगातही ते डगमगले नाहीत की त्यांनी आपले अवसानही गळू दिले नाही… काहींचा अपवाद वगळता ते सही सलामत आपल्या मायदेशी परत आले. खरोखरचं मनातल्या मनात त्यांचे कौतुक करावे असे वाटले व अभिमानाने ऊर भरून आला..

अनेकांना ख-या खोट्या गुन्ह्यासाठी आर्क्टिक भागातल्या गुलामांच्या कामगार कँपात पाठविण्यात आले होते. तिथून निसटून जाण्याचा प्रयत्न एका छोट्या गटानं जीवावर उदार होऊन केला. स्लाव्होमिर रावीझ हा त्या पैकी एक तरूण फक्त चोवीस वर्षाचा… पोलंडच्या लष्करात लेफ्टनंटच्या हुद्यावर… १९३९ साली रशियन गुप्तहेरांनी हेरगिरीच्या आरोपावरून पकडले. आपण निरपराध असल्याचे सांगूनही त्यांनी मानसिक शारिरीक छळ करून त्याला २५ वर्षे कारावासाची शिक्षा सुनावली. त्या भयानक वातावरणात २५ वर्षे काढायची ?  या जाणीवेनीच अंगावर काटा तर आलाच पण कारण नसताना निरपराध माणसाला शिक्षा का? हा प्रश्नही वारंवार मनात आला.

उत्तर सैबेरियातल्या एका तुरूंग तळावर सहा सवंगडी जमवून त्यांनी तेथून केलेले पलायन, कमीतकमी वेळात आखलेली मोहीम, पलायन करण्यासाठी लावलेली जीवाची बाजी तितक्या लवकरात लवकर जेवढे दूर जाता येईल तेवढे गेले पाहिजे ह्याची मनोमन जाणीव, समविचारांचे समव्यावसायिक एकत्र चालू लागल्याची माहीती… हे सर्व वाचताना त्यांनी कोणकोणत्या संकटांशी मुकाबला केला असेल व कसा केला असेल याचे चित्रच डोळ्यासमोर उभे राहते व अंगावर नकळत शहारा उभा राहतो.  एवढं वास्तवदर्शी वर्णन केलेलं आहे जणू  आपणचं ते प्रत्यक्ष भोगतोय..

पुस्तकातले जीवघेणे प्रसंग तर आपल्या नजरेसमोरून जाताना मन अंर्तःमुख होऊन जाते. पुस्तकाचे लेखन वापरण्यात आलेली भाषाशैली आणि शब्द सामर्थ्याने रेखाटलेला प्रत्येक शब्द हे सर्वांत मोठे वैशिष्ट्य म्हणता येईल. कारण हजारो किलोमीटरवर घडलेली ही घटना प्रत्येक शब्दांगणिक आपल्या डोळ्यासमोर उभी राहते. प्रत्येक प्रसंग जिवंत होतो आणि आपल्याला अंतर्मुख करतो. शौर्य, क्रौर्य, भीती, दहशत, जिद्द  ध्यास अशा अनेक भावनांचा प्रत्यय प्रत्येक वाचकांना येतो यात शंका नाही. हा सुंदर अनुभव या पुस्तकाने दिला आहे.

असे हे अनोखे लिखाण खरचं जगाकडे पाहण्याची नवी दृष्टी नवी दिशा देऊन जाते..

 

©  सुश्री संगीता कुलकर्णी 

लेखिका /कवयित्री

ठाणे

9870451020

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – पुस्तकांवर बोलू काही ☆ ‘अंतर्बोल’ – सौ. राधिका भांडारकर ☆ श्री सुहास रघुनाथ पंडित

श्री सुहास रघुनाथ पंडित

? पुस्तकावर बोलू काही ?

 ☆ पुस्तकांवर बोलू काही ☆ अंतर्बोल… सौ. राधिका भांडारकर ☆ श्री सुहास रघुनाथ पंडित  ☆ 

पुस्तकाचे नाव           : अंतर्बोल (कथा संग्रह) 

लेखिका                    :  सौ. राधिका भांडारकर

प्रकाशक                   : यशोदीप पब्लिकेशंस

पृष्ठ संख्या                  : 162 

मूल्य                         :  रु 200

ऑनलाइन उपलब्ध ->> अंतर्बोल… सौ. राधिका भांडारकर

सौ. राधिका भांडारकर यांचा ‘अंतर्बोल ‘ हा कथासंग्रह नुकताच प्रकाशित झाला. हा त्यांचा चौथा कथासंग्रह. त्यांचे साहित्य ई अंकातून वाचले होते. त्यामुळे हा कथासंग्रह वाचण्याची उत्सुकता होतीच.

हा कथासंग्रह वाचून झाल्यावर एक वाचक म्हणून तो कसा वाटला हे सांगण्याचा हा प्रयत्न. हे  फक्त सामान्य वाचकाचे मत आहे.

‘अंतर्बोल’ या कथा संग्रहात एकंदर तेरा कथा आहेत. प्रत्येक कथा साधारणपणे अकरा पानांची आहे. त्यामुळे या कथा अगदी लघु ही नाहीत . कथा वाचल्यानंतर लक्षात येते की कथेतील पात्रे, प्रसंग व्यवस्थित रंगवण्यिसाठी एवढा आकार आवश्यकच आहे. दुसरे म्हणजे बहुतेक सर्व कथा मध्यम वर्ग किंवा उच्च मध्यम वर्ग यावर आधारित  अशाच आहेत. म्हणजे लेखिकेने जे विश्व  अनुभवले आहे किंवा जवळून पाहिले आहे, त्यातून जे  भावबंध मनात निर्माण झाले, ते ‘अंतर्बोल’ च्या निमित्ताने वाचकांसमोर उलगडून दाखवले आहे. त्यामुळे लेखनात कुठेही कृत्रिमपणा जाणवत नाही. जे घडले, जे दिसले, जे जाणवले ते साध्या  सोप्या शब्दात व्यक्त केले;असे या कथांचे स्वरूप आहे. त्यामुळे कथांमधील पात्रे, प्रसंग हे आपल्या आजूबाजूचेच वाटतात.

आता जरा कथांकडे वळूया.

‘त्यांचं चुकलं’ ही या संग्रहातील पहिली कथा. जीवनसाथी शिवाय एकाकी पडलेल्या केसकरांची मानसिक अवस्था या कथेत मांडली आहे. घरातील संवाद तुटत चालला आहे. दोन पिढ्यांत वैचारिक व मानसिक अंतरही वाढत चालले आहे. घरात सुख आहे पण फक्त  दिखावू !त्यामुळे एकाकीपणा वाढतो आहे. काळाबरोबर न राहण्याचे परिणमही भोगावे लागताहेत. मृत्यू हाच सर्वात जवळचा मित्र वाटतो. अशी ही शोकांतिका!

‘आराखडा’ ही दुसरी कथा. या कथेतील नायकाने आपल्या आयुष्याचे नियोजन केले आहे. आयुष्याच्या एका विशिष्ट टप्प्यापर्यंत ते यशस्वी होते ही. पण नंतर मात्र त्याच्या या आराखड्यावर ओरखडे उमटू लागतात. नवी पिढी,  नवी  जीवनपद्धती, नवे विचार यामुळे केलेले नियोजन बिघडून जाते. आपण कुटुंबात असून एकाकी पडलोत असे वाटू लागते. पण पत्नाची खंबीर साथ असल्यामुळे संध्याछाया सुद्धा ‘  सुखविती हृदया’ याचा प्रत्यय येतो. या कथेचा शेवट व विशेषतः शेवटच्या चार ओळी वाचकालाही  सुखावून जातात.

‘डाॅल्फीन’ या कथेत आपला देश सोडून परदेशी वास्तव्य कराव्या लागणार्या एका आजीबाईंची मानसिक आंदोलने टिपली आहेत. उतार वयात आयुष्याला वेगळे वळण लावून घेणे, नवीन जीवन पद्धती स्विकारणे, त्याच वेळेला भूतकाळातील आठवणी, अशा सर्व संमीश्र भावनातही कुठेतरी एकटेपण जाणवत असते. उसळ्या मारणार्या मनाला डाॅल्फीनची दिलेली उपमा अगदी सार्थ वाटते.

‘ बोच’ या कथेत एकत्र कुटुंब पद्धती चे उत्तम चित्रण पहावयाला मिळते. एकाच कुटुंबातील व्यक्तिंचे वेगवेगळे मानवी स्वभाव अनुभवायला मिळतात. वाचकाने जर एकत्र कुटुंब पद्धती अनुभवली असेल तर अशा घटना थोड्याफार फरकाने आपल्याही कुटुंबात घडल्या होत्या याची खात्री पटेल.

‘ तो ‘ मधला विहंग हा चुकीच्या वाटेने जाणार्या तरूण पिढीचे प्रतिनिधित्व करतो. वय आणि मनाचा असमंजसपणा यामुळे आयुष्य भरकटत जाऊ शकते. कथेत शेवटपर्यंत उत्सुकता वाटते.  पण शेवट

असमाधानकारक  वाटतो. विहंगच्या आयुष्याला कोणती दिशा मिळाली हे सांगियला हवे होते असे वाटते.

‘सा  रे’ या कथेत एकत्र कुटुंबातील उपेक्षित महिलेचे जिणे दाखवले आहे. अशा स्त्री ची मानसिक अवस्था काय असेल याचे चित्रण केले आहे.

‘पप्पांचं वाक्य’ म्हणजे ‘ अखंड सावधान असावे ‘ या उक्तीची आठवण करून देणारी कथा.  सरळमार्गी माणसाला या व्यवहारी जगात जगणं किती अवघड आहे हे दाखवून देणारी कथा.

निवृत्तीनंतर बदललेली जीवनपद्धती, एकाकीपणाची भावना, बदल म्हणून केलेला दूरचा प्रवास, पण तिथेही जोडीदार बरोबर असूनही वाटणारं एकाकीपण, आपण दुर्लक्षित गेलो आहोत ही भावना आणि शेवटी दूर होणारा गैरसमज अशी भावनांच्या गुंत्यात अडकलेल्या तिची कथा म्हणजे ‘दोन ओळी’.

कडक शिस्तीच्या आजोबांचे व्यक्तिचित्रण करणारी कथा म्हणजे ‘ हरवले ते ‘. असे आजोबा किंवा अन्य कोणी ना कोणी मोठ्या कुटुंबात असतातच. फणसासारखं व्यक्तिमत्व. पण आपले व्यक्तिमत्व घडवण्यात त्यांचा मोलाचा वाटा असतो. ही आजोबांची आठवण म्हणजे त्यांच्याविषयी कृतज्ञताच व्यक्त केली आहे.

एखाद्या व्यक्ती प्रमाणे एखाद्या वस्तू वर, गावावर, ठिकाणावरही प्रेम बसू शकते. विरह झाला तरी आठवणी मनातून जात नाहीत. मनात जपून ठेवलेल्या  आपल्या जुन्या घराच्या स्मृती  अंतर्बोल बनून बाहेर पडल्या की ‘ वास-निवास’ सारख्या कथा जन्म घेतात.

फक्त आपल्याच नव्हे तर दुसर्याच्या स्वप्नभंगाचे  दुःखही वेदनादायी कसे ठरते हे दाखवून देणारी कथा म्हणजे ‘ स्वप्न’. या स्वप्नभंगाला अजाणतेपणे का असेना आपण जबाबदार असलो तर मन लागणारी बोच आयुष्यभर आपल्याला माफ करत नाही.

लेखिकेने स्वतः बॅंकेत नोकरी केली असल्यामुळे बॅंकेचे कार्यालयीन अंतरंग लेखिकेला चांगलेच माहीत आहे. त्यामुळे ‘शस्त्र’ या कथेत रंगवलेले प्रसंग, प्रतिक्रिया, वातावरण हे अगदी वस्तुस्थितीला धरूनच आहे. एक बॅंक कर्मचारी म्हणून मला या कथेचा आस्वाद घेताना फारच मनोरंजन झाले.

‘ इनबाॅक्स’ या कथेत  नवीन पिढीला समजेल अशा भाषेत समजून सांगणारी आई  ही जास्त कौतुकास्पद वाटते. अर्धवट वयातील मुलाला  समजून घेऊन तिने प्रश्न अगदी सोपा करून टाकला आहे. मनाच्या इनबाॅक्स मध्ये अनुभवांचे आणि विचारांचे मेल येतच राहणार. पण कोणत्याच व्हायरसला बळी पडायच नाही, असं सागणारी ही कथा तरूण पिढीलाही नक्कीच आवडेल.

तर अशा या विषयांच्या विविधतेने नटलेल्या तेरा कथा. गप्पा मारता मारता सहजपणे सांगाव्यात इतक्या साधेपणाने सांगितलेल्या गोष्टी. बोजड शब्दांचे अवडंबर न माजवता साध्यातून सुंदर कथानक आणि आशय देणार्या या कथा लवकरच लेखिकेला चौथ्याकडून पाचव्या संग्रहाकडे घेऊन जावोत हीच सदिच्छा  !.

 

©  श्री सुहास रघुनाथ पंडित

सांगली (महाराष्ट्र)

मो – 9421225491

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – पुस्तकांवर बोलू काही ☆ इन्शाअल्लाह… श्री अभिराम भडकमकर ☆ परिचय – श्रीमती उज्ज्वला केळकर

श्रीमती उज्ज्वला केळकर

?पुस्तकावर बोलू काही?

☆ इन्शाअल्लाह… श्री अभिराम भडकमकर ☆ परिचय – श्रीमती उज्ज्वला केळकर

पुस्तकाचे नाव – इन्शाअल्लाह

प्रकाशक – राजहंस प्रकाशन

लेखक  – अभिराम भडकमकर

पृष्ठ संख्या – 325

मूल्य – रु 350

इन्शाअल्लाह (एक आस्वादन) : पुस्तक परिचय

अलीकडेच एक नवीन चांगले पुस्तक वाचनात आले. “इन्शाअल्लाह.” लेखक अभिराम भडकमकर. तळा- गाळातल्या मुस्लीम समाजातील लोकांच्या स्थिती-गतीचे, दु:ख-दैन्याचे प्रातिनिधिक म्हणता येईल असे दर्शन यात घडते. अल्लाह, महजब, कुराण आणि शरीयत या चौकटीत हा समाज बंदिस्त आहे. शरीयतचे कायदे, कयामताचा (अंतीम न्याय-निवाड्याचा दिवस), त्यानंतर मिळणार्‍या जन्नतचे( स्वर्ग) स्वप्न किंवा दोजख (नरक) या पलीकडे त्यांच्या विचाराची धाव जात नाही. किंबहुना, तशी ती जाऊच नये असा समाजातील काही पुढार्‍यांचा प्रयत्न आहे. अज्ञान, दारिद्र्य, अंधश्रद्धा यांनी त्यांचं आयुष्य जखडून ठेवलय. जन्नतची कल्पना करता करता आपलं सध्याचं वास्तव आयुष्यच दोजख होऊन गेलय, याची त्यांना गंधवार्ताही नाही. स्त्रियांची परिस्थिती तर त्याहूनही करूणाजनक. त्या बुरख्यात कैद. ना विद्या. ना सन्मानाने जगण्याची संधी. ती खतावन.. .. बाई जात. सतत पुरुषी वर्चस्वाखाली तिने राहायचं. तीन तलाकाची टांगती तलवार सारखी डोक्यावर. पोटगी नाही. स्त्री म्हणजे मुलं जन्माला घालणारं आणि मरद जातीसाठी राबणारं मशीन अशीच समाजाची धारणा आहे.

या कादंबरीतील मुमताजचं चित्रण हे सर्वसामान्य मुस्लीम स्त्रीचं प्रातिनिधिक चित्रण आहे, असे म्हणता येईल. मुमताजचा नवरा उस्मान मुमताजच्याच घरात काही काम-धंदा न करता राहतो आहे. दारू, पत्ते यात वेळ घालवतो आहे आणि नवरा म्हणून मुमताजवर आरडा-ओरडा करतो आहे. तिला मारहाण करतो आहे, पण त्याला तलाक देण्याचा तिला अधिकार नाही. पुरुष मात्र कधीही मनात आलं की तलाक देऊ शकतो.    

वरील परिस्थिती बदलली पाहिजे. शिक्षणाची कास धरली पाहिजे. समान नागरी कायदा झाला पाहिजे, असं म्हणणारी रफिकसारखी सुधारणावादी तरुण मंडळी यात आहेत. हजारो वर्षापूर्वी लिहिलेल्या कायद्याचा आज उपयोग नाही. “मी अल्लाह, मजहब, कुराण, शरीयत, काही मानत नाही. मी अल्लाहची पैदाश नसून निसर्गाची पैदाईश आहे,” असं म्हणणारा रफिक  मुसलमानांच्या दृष्टीने काफीरच आहे, पण तो आणि त्याची ‘फतेह’ संस्था मुस्लीम समाजाच्या  उन्नतीसाठी तळमळीने कार्य करते आहे. त्याच्या विचाराने झुल्फीसारखे अनेक तरुण भारलेले आहेत. त्यांनाही सुधारणा व्हाव्यात असं वाटतय, पण त्या धर्माच्या चौकटीत राहून व्हाव्यात, असा त्यांचा प्रयत्न आहे. त्यांना विरोध करणारेही कट्टर मुसलमान यात आहेत. मुसलमानांचा हक्क आणि अधिकार याविषयी जागरूक असणारी उदारमतवादी सेक्युलर मंडळी यात आहेत. हिंदूंच्या अंधश्रद्धेवर टीका करणार्‍या, पण मुसलमानांच्या अंधश्रद्धेबाबत ब्रही न काढणार्‍या या सेक्युलर मंडळींची कुचेष्टा करणारी कडवी हिंदुत्ववादी मंडळी आहेत. मुसलमानांनी आपला वेगळेपणा न राखता मुख्य प्रवाहात सामावून जायला हवं, असं मनापासून वाटणारे मोकळ्या मनाचे तरुण हिंदू युवक यात आहेत.

रहीमनगर वस्तीत ही कथा घडते. वस्तीतला तरुण मुलगा जुनैब गायब असतो. पोलीस त्याला पकडण्यासाठी येतात. बॉम्बस्फोट घडवून स्टेशन उडवून लावण्याच्या कटात तो सामील असल्याचा पोलिसांना संशय आहे. आपला साधा सरळ मुलगा असं कधीच करणार नाही, याची त्याच्या अम्मीला म्हणजे जमिलाला खात्री आहे. जुनैब सापडत नाही, पण वस्तीतल्या काही तरुण मुलांना पोलीस घेऊन जातात. त्यांना सोडवण्यासाठी मोमीन वकिलांना बोलावलं जातं. मोमीन सल्ला देतो, की पोलिसांविरुद्ध तक्रार करायची, की गेले सहा महीने, मोहल्ल्याची जागा बिल्डरला लिहून द्या, असं पोलीस धमकावताहेत. अल्लाहच्या नावाने टाहो फोडणारे, अल्लाहला खोटं चालत नाही म्हणणारे मूलतत्ववादी, मोमीनचं म्हणणं मान्य करतात. सगळा मोहल्ला त्याच्या बाजूने होतो. एकटी जमीला कणखरपणे नकार देत म्हणते. ‘ऐसा कुछ हुवाच नही. क्या ऐसा सच अल्लाह कबूल करेगा?’ ती कणखरपणे म्हणते.

‘छोकरोंको छुडाना है तो ऐसा करनाच पडेगा’,  ते म्हणतात. ती तक्रार अर्जावर सही करायला नकार देते. मोर्चा निघतो. तक्रार अर्ज दिला जातो. पण कादंबरीच्या शेवटापर्यंत जुनैदचा शोध लागत नाही की मुलं सुटत नाहीत. या घटनेकडे वेगवेगळ्या संघटना कसं बघतात, एकाच घटनेचे वेगवेगळे अर्थ कसे लावले जातात, याची छान मांडणी या पुस्तकात केली आहे.

रहीमनगरच्या वस्तीत झुल्फी सुधारणा घडवण्याचा प्रयत्न करतो. साचलेल्या पाण्याच्या डबक्यांसारखी झालेली लोकांची मने आणि मेंदू– त्याला वाट काढून प्रवाहीत करण्याचा तो प्रयत्न  करतो. रक्तदान शिबीर, गप्पा-संवाद-चर्चा यासारखे कार्यक्रम, उपक्रम सातत्याने राबवतो. वस्तीतील लोकांच्या मनात प्रश्न निर्माण झाले पाहिजेत, त्यांनी विचार केला पाहिजे, यासाठी तो प्रयत्नशील आहे. धर्माच्या चौकटीत राहून तो हे करतोय, त्यामुळे त्याला वस्तीतल्या सामान्य लोकांचा पाठिंबाही आहे. कोल्हापुरात होणार्‍या साहित्य संमेलनासाठी तो वस्तीत कार्यालय सुरू करतो. यात रफिक भाईंच्या विचारांवर आधारित चित्ररथ काढायचे  ठरवतो. असे अनेक उपक्रम तो आयोजित करतो. त्या निमित्ताने चर्चा होते. लोकं विचार करू लागतात. आपली मतं मांडू लागतात. कादंबरीच्या शेवटी त्याने तिथे जे पेरलं, ते उगवून आलेलं दिसतं. कट्टर मुसलमानांचा त्याला विरोध होतो. अडथळे आणले जातात, पण वस्तीतील सगळे तरुण, बायका, मुले त्यांना विरोध करत चित्ररथ पुढे नेतात. बायका-मुलींनी बुरखा काढलेला आहे. चित्ररथ पुढे नेताना घोषणा दिल्या जातात,

‘नये दौरके साथ चलेंगे

इन्शाअल्लाह—अल्लाहकी यही मर्जी है॰

हम जिहादी आमनके

इन्शाअल्लाह

सब पढ़ेंगे सब बढ़ेंगे

इन्शाअल्लाह’

चित्ररथ पुढे जातो. कादंबरी संपते. विचारप्रधान, वास्तववादी अशी ही सामाजिक कादंबरी आहे. कादंबरीमधे संवादासाठी कोल्हापुरात बोलली जाणारी बगवानी बोली वापरली आहे. मूळ  आशयाशी ती अगदी समरस झाली आहे. लेखकाची मीडियावर चांगली पकड असल्याने त्यातले विचार, वाद-विवाद आपण प्रत्यक्ष त्या त्या टोळक्यात जाऊन, तिथे बसूनच ऐकतो आहोत, असं वाटतं. तसेच झुल्फी, जमिला, मुमताज, रफिक, फिदा, शिखरे यासारख्या सार्‍याच व्यक्तिरेखाही प्रत्यक्षदर्शी झाल्या आहेत.

प्रत्येकाने एकदा तरी वाचून आनंद घ्यावा, असं म्हणण्यापेक्षा सध्याची परिस्थिती समजून घ्यावी, यासाठी ही कादंबरी वाचावीच असं मी म्हणेन.

 

© श्रीमती उज्ज्वला केळकर

176/2 ‘गायत्री’, प्लॉट नं 12, वसंत साखर कामगार भवन जवळ, सांगली 416416 मो.-  9403310170

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – पुस्तकांवर बोलू काही ☆ अंतर्बोल… सौ. राधिका भांडारकर ☆ परिचय – श्रीमती उज्ज्वला केळकर

श्रीमती उज्ज्वला केळकर

☆पुस्तकांवर बोलू काही ☆ अंतर्बोल… सौ. राधिका भांडारकर ☆ परिचय – श्रीमती उज्ज्वला केळकर

अंतर्बोल : पुस्तक परिचय

नुकताच राधिका भांडारकर यांचा ‘अंतर्बोल’ हा कथासंग्रह पाहिला. त्यांचा तो चौथा कथासंग्रह. प्रथम मनात भरलं, ते मुखपृष्ठ. काहीसं प्रतिकात्मक वाटलं ते. अवकाशाच्या पोकळीत एक झाड. त्यावर बसलेले एक स्त्री. काही वाचते आहे. निरखते आहे. ते झाड मला त्या स्त्रीच्या मनाचं प्रतीक वाटलं. आत्ममग्न, मनस्वी अशी ती स्त्री आहे, असं वाटलं. कथा वाचत गेले, तसतशी मी माझ्या विचारावर अधीक ठाम होत गेले.

सौ. राधिका भांडारकर

जीवन प्रवाहात वहात जाताना अनेक अनुभव येतात. काही लक्षात रहातात. मनमंजुषेत साठवले जातात. या साठवणींचा आठव म्हणजे ‘अंतर्बोल’. या मनातल्या आठवणी जनात येताना कथारूप घेतात. सगळं कसं आनुभवलेलं. काल्पनिक काहीच नाही, याची प्रचिती देतात. आठवणी जाग्या होतात, तेव्हा त्याच्या मागोमाग काही वेळा विचार येतात, कधी आत्मसंवाद होतो. कधी इतरांशी संवाद होतो. कधी तिची निरीक्षणे येतात. कधी विचार, कधी काही तथ्य.

यातली पहिलीच कथा,’ त्यांचं चुकलं’. ही कथा म्हणजे, टिन्केंचं शब्दचित्र. टिन्के म्हणजे तीन के. केशव काशीनाथ केसकर. टिन्के म्हंटलं तर एकाकी आहेत. पत्नी नाही  म्हणून. म्हंटलं तर मुलगा, सून, नातवंडांच्यात आहेत. तसे एकाकी नाहीत.  म्हंटलं तर स्वावलंबी आहेत. स्वत:चं सगळं स्वत: करतात. म्हंटलं तर परावलंबी. कसे? सुनेला दोन वर्ष जपानला जायची संधी मिळालीय. तिच्याबरोबर नवरा-मुले जाऊ शकतात, पण मग टिन्केंचं काय? घरी एकटे रहाणे, किंवा मग काही काळासाठी कम्युनिटी सेंटरमध्ये रहाणे, हे पर्याय होतेच की. पण म्हणजे स्वावलंबी असलेल्या टिन्केंचं परावलंबनच की!

राधिकेला एकदम आठवतं, आपण परदेशी मुलीकडे जाणार असलो, की प्रश्न पडतो, झाडांचं काय? मैत्रीण मुलाकडे कॅनडाला जाणार असते. पण तेव्हा प्रश्न येतो, त्यांनी सांभाळलेल्या कुत्र्याचं काय? ती मोठ्या सूचकतेने एक निरीक्षण समोर मांडते,

‘झाडं, कुत्रा आणि टिन्के….’

मुलीकडून परत आल्यावर तिला कळतं, ‘झोपच्या गोळ्या घेऊन टिन्केंनी आपलं आयुष्य संपवलं. त्यावर विचार करत करत ती पुन्हा पुन्हा म्हणते, ‘त्यांचं चुकलंच….’ तिच्या मनात येत रहातं, दुसरे पर्याय होतेच की त्यांच्यापाशी.

टिन्केंप्रमाणे सदाशिव, गुलाबामावशी, विहंग अशी आणखीही काही शब्दचित्रे यात आहेत. अशी शब्दचित्रे, अशी वर्णने की आपण काही वाचतो आहोत, असं वाटतच नाही. आपण त्यांना प्रत्यक्ष बघतो आहोत, त्यांच्या भोवतीचे वास्तव, घटना, प्रसंग प्रत्यक्ष अनुभवतो आहोत, असंच वाटतं. सदाशिवसंबंधीच्या आठवणी सगळ्या कडूच. त्या मांडण्याला निमित्त आहे, त्याचा आलेला फोन. त्याला नानीला म्हणजे त्यांच्या आजीला भेटायचय. पण पुढे काय झालं, याबद्दल त्रिलोक म्हणजे कथेचा निवेदक उदासीन आहे. तो म्हणतोय, ‘काळाची पानं पुसता येत नसली, तर ती बंद करून ठेवलेलंच चांगलं.... उघडतील कदाचित नवी दारं… तेव्हा पानं कोरी असावीत, आणि शब्दही नवीन असावेत.’.… आशा तर्‍हेची भाष्य विविध कथांमध्ये अनेक ठिकाणी आहेत.

गुलाबमावशी सुंदर. अतिशय देखणी. पण कायमच दीनवाणी. बापुडवाणी. आधी नवर्‍याच्या आणि नंतर नवर्‍याबरोबर मुलांच्याही दबावाखाली असलेली. नवर्‍याच्या अव्यवहारीपणामुळे संसाराची दैना झालेली, पण हे दैन्य अनुभवणारीही तीच आहे. बाकी आपआपल्या ठायी मजेत आहेत. नवरा गेला तेव्हा त्याच्या पायाशी पोत, बांगड्या ठेवून ती कुंकू पुसते. डोळ्यात पाण्याचा ठिपूसही नाही. बिंबा म्हणते, ‘त्याच्याशी कुंकवाचं, मंगळसूत्राचंच नातं होतं फक्त. ते तिनं त्याच्या आयुष्यापर्यंत वाहीलं आणि परत केलं. बिंबाच्या स्वप्नात मात्र ती वेगळंच रूप घेऊन येते. तिला गुलाबमावशी जशी वागावी असं वाटत होतं, तसं. त्यात ती तेजाची शलाका होऊन आप्पांशी भांडत असते. आप्पा तिच्या तेजोमय आकृतीपुढे विनम्र होऊन खालमानेने उभे असतात. तिच्या प्रत्येक शब्दाने अधीकच जखमी होऊन त्यांचा पार लोळागोळा झालेला असतो.

‘तो’ मध्ये पौगंडावस्थेतील भरकटलेल्या विहंगाचे चित्रण आहे.

‘आराखडा’ आणि ‘डॉल्फिन’ या कथा काहीशा प्रातिनिधिक म्हणता येतील. विशेषत: मध्यमवर्गीय कुटुंबातल्या. सर्वसामान्य मध्यमवर्गीयाला सवय असते, आपल्या वर्तमान आणि भावी योजनांचा आराखडा तयार करायची. तो करताना बहुधा बायको-मुलांना गृहीत धरलं जातं. पिढीतलं वैचारिक अंतर, व्यक्तीगत आवडी-निवडी. इच्छा-आकांक्षा, यांचा वडीलधार्‍यांकडून विचार केला जात नाही. मग आराखडा विस्कटण्याची वेळ येते. मन निराशेनं भरून जातं. या सार्वत्रिक दिसणार्‍या वास्तवावर ‘आराखडा’ या कथेत लेखिकेनं नेमकं बोट ठेवलं आहे. या वस्तुस्थितीनं निराश न होता, त्यांचं स्वातंत्र्य त्यांना देऊन आपण मजेत राहू’ असं, आयुष्यभर नवर्‍याच्या मुठीत राहिलेली बायको सुचवते आणि त्यालाही ते पटतं. कथेचा शेवट –  मनाच्या या कोपर्‍यात काही तरी कोसळलं होतं. पण त्याच वेळी दुसर्‍या कोपर्‍यात एक नवाच अंकुर हळू हळू उलगडत होता.’ असा सुखद आशावादी आहे.

‘डॉल्फिन’मध्ये मुला-नातवंडांपर्यंत संसार झालेल्या आणि आता परिस्थितीने परदेशात मुलाकडे राहावं लागणार्‍या, सुशिक्षित, सुसंस्कृत वयस्क स्त्रीचं एकाकीकपण अधोरेखित करण्याचा प्रयत्न आहे. आजच्या सर्वसामान्य मध्यमवर्गीय घरातलं, हे चित्र प्रातिनिधिक म्हणायला हरकत नाही यातील नायिकेला आपण एकाकी आहोत, असं सतत वाटत असतं.   पण एका प्रसंगाने नायिकेच्या मनातले मळभ दूर होतं. आपल्या नातवंडांना आपली किती काळजी आहे, हे तिच्या लक्षात येतं. मग तिचा स्वत:च्या मनाशीच संवाद सुरू होतो.

‘उगीच वाटतं आपल्याला आपण एकटे आहोत म्हणून… कुणा ना कुणाशी आपण सतत कुठल्या ना कुठल्या अदृश्य पण चिवट धाग्यांनी जोडलेले असतो…. मग जगाच्या पाठीवर कुठे का असेना…’

मला उमगलेले राधिकेचे ‘अंतर्बोल’ मी आपल्या पुढे प्रगट केले. शब्दमर्यादेमुळे  इतर चांगल्या कथांवर लिहिता आले नाही आणि त्यातल्या लावण्यस्थळांची उकल करता आली नाही. शेवटी एवढेच म्हणेन, प्रत्येकाने राधिकेचे ‘अंतर्बोल’ ऐकावे…. म्हणजे वाचावे… त्या बोलांचा नाद वाचताना कानात उमटेलच आणि न जाणो… कित्येक ठिकाणी ते आपल्याला आपलेही ‘अंतर्बोल’ वाटतील.

© श्रीमती उज्ज्वला केळकर

176/2 ‘गायत्री’, प्लॉट नं 12, वसंत साखर कामगार भवन जवळ, सांगली 416416 मो.-  9403310170

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – पुस्तकांवर बोलू काही ☆ ‘शोध’ – श्री मुरलीधर खैरनार ☆ परिचय – श्री विनय माधव गोखले

☆ पुस्तकांवर बोलू काही ☆ ‘शोध’ – श्री मुरलीधर खैरनार ☆ परिचय – श्री विनय माधव गोखले ☆ 

पुस्तकाचे नाव : शोध 

लेखक : श्री मुरलीधर खैरनार  

पृष्ठ संख्या : 515

मूल्य : रु 510

प्रकाशक : राजहंस प्रकाशन

अमेज़न लिंक >>  ‘शोध’ – श्री मुरलीधर खैरनार

शोध – एक ऐतिहासिक रहस्यकथा

“१६७० साली शिवाजी महाराजांनी दुसर्‍यांदा सुरत लुटली तेव्हा त्या खजिन्याचा एक मोठा भाग गोंदाजी नारो ह्या त्यांच्या सरदाराने परतीच्या वाटेत असताना मोंगलाच्या हाती सापडू नये म्हणून बागलाण प्रांतातील डोंगराळ भागात लपवून ठेवला होता. त्याचा एक नकाशा त्याने बनवला पण तो स्वत: मोगलांच्या हाती सापडून मारला गेला व तो नकाशा शिवाजी महाराजांपर्यंत पोहोचूच शकला नाही. गेली ३५०+ वर्षे अनेक पिढ्या ह्या अब्जावधींच्या खजिन्याचा शोध घेत आहेत पण तो अजूनपर्यंत कुणाला सापडलेला नव्हता.

हा धागा पकडून सुरू झालेली कथा वेग पकडते ते क्लारा ग्रेंजर ह्या ब्रिटिश इतिहास संशोधिकेचा मुंबईतील आलिशान हाॅटेलात खून होतो त्यानंतर… आणि तिथून सुरू झालेली ही  रहस्यमालिका आपल्याला कसारा, नाशिक, दिंडोरी, कळवण, बांद्रा, सातमाळ्याच्या पर्वतरांगांतील, अहिवंत, अचला, कोळदेहर, सप्तश्रुंग आदि गडदुर्ग, तिथले आदिवासी व त्यांच्या वैशिष्ट्यपूर्ण प्रथा अशा विविध   प्रांतांतून फिरवत राहते.

कूटनीती, राजकारण, पैसाकारण, पाठलाग, खून ह्यांचे एकापाठोपाठ एक सत्र  सुरू होते आणि ही वेगवान कथा वाचकांस अक्षरश: खिळवून ठेवते.

खजिन्याच्या गुप्त रहस्याचा भेद करताकरता लेखकाने जवळजवळ ५०० पानी पुस्तक लिहीले आहे.

त्याआधी पुस्तकामधूनच आपल्याला थोडे सुरतेच्या इतिहासात डोकवावे लागते. त्याकाळी हिंदुस्तानातील ८० टक्के निर्यात त्याकाळी एकट्या सुरतेच्या बंदरातून होत असे. म्हणूनच इंग्रज, पोर्तुगीजांनी, गुजराती व्यापार्‍यांनी सुरतेमध्ये स्वत:च्या मोठाल्या वखारी उभ्या केल्या होत्या. त्यांची सुरक्षेची जबाबदारी होती मोगलांकडे आणि त्याबदल्यात मोगलांना घसघशीत धनप्राप्ती होत असे. ही सर्व माहिती हेरांमार्फत शिवाजी महाराजांना समजली होती.

पन्हाळ्याच्या वेढ्यातून सुटल्यावर त्यांनी पुढील जवळपास दीड वर्षे मोहिमेची आखणी हेरांमार्फत सुरू ठेवली होती. सर्व मोठमोठे व्यापारी खजिना कुठे दडवीत होते ही बित्तंबातमी हेरांनी मिळवली होती. सुरतेच्या पहिल्या लुटीनंतर सुरतेच्या आजुबाजूच्या खेड्यांमधील वाड्यांत काहींनी संपत्ती दडवली होती, तीही माहिती काढली होती. सुरतेची दुसरी लूट अवघ्या तीन दिवसांत उत्तम नियोजन पद्धतीने पार पाडली गेली आणि सुरत जवळपास रिकामी झाली होती. खजिन्यामध्ये मुख्यत्वे शुध्द सोन्याच्या लडी, ठोकळे, विटा, सोन्याचांदीची बहामनी, अरबी, फारसी, युरोपियन नाणी, दागिने, हिरे-माणके, पाचू आदींचा समावेश होता.

शिवाजी महाराजांनी परतीचा मार्ग वेगळा आखला होता आणि सैन्याचे व लुटीचे दोन-दोन भाग केले होते… एक भाग मोरोपंत पिंगळे आणि स्वत: बरोबर तर  दुसरा गोंदाजीच्या तुकडीकडे दिला.

मोगलांशी लढत देत महाराज स्वत: राजगडावर सुरक्षित पोहोचले.

परंतु सुमारे ७००० घोड्यांच्या पाठीवर खजिना लादून आणताना गोंदाजीचा परतीचा मार्ग बराचसा मोगलांच्या ताब्यातील प्रदेशातून जात होता. त्यामुळे तो सुरक्षित आणणे गोंदाजीला जिकिरीचे आणि धोक्याचे होते. त्यातच सुरतेमधील मोगली सरदाराने साल्हेर किल्याच्या मोगली किल्लेदारास पुढे येणार्‍या खजिन्याची वर्दी धाडली होती आणि स्वत: खजिन्याचा पाठलाग सुरू केला. एवढी लूट हातातून सहजासहजी जाऊन कोण देईल? पिछाडीकडून आणि दोन्ही बाजूंनी हल्ले करून गोंदाजीचे सर्वच्या सर्व सैन्य कापून काढले. पण त्याआधीच गोंदाजीने सर्व खजिना लपविण्यात यश मिळवले होते. मोगलांना सर्व ७००० घोडे माळरानावर रिकामे साडून दिलेले मिळाले पण पाठीवरील सर्व लूट गायब होती.

तात्पर्य म्हणजे, मोरोपंत पिंगळे ह्यांच्या कडील १/३ लूट लोहगड-राजगडावर पोहोचली पण गोंदाजीकडील २/३ भागाचा अजिबात शोध लागला नाही; ना सुरतेतील व्यापार्‍यांना, ना मोरोपंत पिंगळ्यांना, ना पुढच्या पिढीतील मराठ्यांना, ना मोगलांना, ना पेशव्यांना, ना इंग्रजांना. पुढेपुढे मग लोकांनी हा शोध घेणेच सोडून दिले. काहींचे असेही म्हणणे पडले की असा काही खजिना नव्हताच, गोंदाजीची केवळ दंतकथा आहे वगैरेवगैरे.

तीन वर्षांच्या अभ्यासानंतर जुलै २०१५ साली प्रकाशित झालेली ही भन्नाट खजिनाशोध कथा आहे. गडदुर्ग आणि इतिहासाची आवड असलेल्यांनी वेळ काढून जरूरजरूर वाचावी.”

सर्जनशील लेखनासाठी मुरलीधर खैरनार यांना कुसुमाग्रज प्रतिष्ठानकडून अभ्यासवृत्ती देण्यात आली होती. ही अभ्यासवृत्ती प्रतिष्ठानने जाहीर केल्यानंतर ती मिळविणारे मुरलीधर खैरनार हे पहिले मानकरी होते.

© श्री विनय माधव गोखले

भ्रमणध्वनी – 09890028667

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – पुस्तकांवर बोलू काही ☆ ‘लेखननामा’ – माधुरी शानभाग ☆ सौ. गौरी सुभाष गाडेकर

सौ. गौरी सुभाष गाडेकर

 ☆ पुस्तकांवर बोलू काही ☆ ‘लेखननामा’ – माधुरी शानभाग ☆ सौ. गौरी सुभाष गाडेकर ☆ 

लेखननामा

पुस्तकाचे नाव :लेखननामा

लेखिका :माधुरी शानभाग

पृष्ठ संख्या : 175

मूल्य : रु 210

प्रकाशक : सुप्रिया शरद मराठे, नवचैतन्य प्रकाशन, मुंबई

‘लेखननामा’  हा माधुरी शानभाग यांनी स्वतःच्या लेखनप्रवासाचा तटस्थपणे घेतलेला मागोवा आहे. तरुण भारत अक्षरयात्रेत प्रसिद्ध होणाऱ्या ‘लेखननामा’ या सदरातील लेखांचा हा संग्रह आहे.

माधुरी शानभाग यांनी वाङ्मयाचे अनेक प्रकार हाताळले आहेत आणि हात लावला, त्या प्रकाराचे सोने केले आहे. उदा.कथा, विज्ञानकथा, कादंबऱ्या, ललित लेख, चरित्रं, बालसाहित्य, पुस्तकपरिचय, अनुवाद, एवढंच नव्हे, तर ‘फ्रॅग्रन्स ऑफ द अर्थ -पोएम्स ऑफ बहिणाबाई चौधरी’ हा बहिणाबाईंच्या कवितांचा इंग्रजी अनुवाद वगैरे. केवळ सतरा वर्षांत त्यांची चव्वेचाळीस पुस्तके प्रसिद्ध झाली आहेत.

सायन्सच्या प्राध्यापिका (आणि नंतर प्राचार्यही)असल्यामुळे ‘लेखननामा’ मधील लेखन पद्धतशीर, मुद्देसूद, शिस्तबद्ध झाले आहे. प्रत्येक प्रकाराविषयी लिहिताना, त्या प्रकारच्या लेखनाची सुरुवात कशी झाली, इथपासून ते वापरलेली लेखनाची पद्धत, पायऱ्या यांचे व्यवस्थित विवेचन त्यांनी केले आहे.त्या त्या संदर्भातील पारिभाषिक शब्दांचाही (उदा. अनुवादाची स्रोत भाषा व लक्ष्य भाषा )सामान्य वाचकांसाठी खुलासा केला आहे.

थोडक्यात सांगायचं, तर हे पुस्तक म्हणजे नवलेखकांसाठी उत्तम मॅन्युअल आहे. हे वाचून कोणाला आपली लेखनउर्मी शोधण्याची इच्छा झाली, तर या लेखनचरित्राचे सार्थक झाले, असे  खुद्द माधुरी शानभाग यांनीच म्हटले आहे.

© सौ. गौरी सुभाष गाडेकर

संपर्क –  1/602, कैरव, जी. ई. लिंक्स, राम मंदिर रोड, गोरेगाव (पश्चिम), मुंबई 400104.

फोन नं. 9820206306

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – पुस्तकांवर बोलू काही ☆ होलिकोत्सव विशेष – होलीकोत्सव…दोलोत्सव…. ☆ प्रस्तुति – सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे

सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे

 ☆ पुस्तकांवर बोलू काही ☆ होलिकोत्सव विशेष – होलीकोत्सव…दोलोत्सव…. ☆ प्रस्तुति – सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे ☆ 

वाचताना वेचलेले:

अरुणा ढेरे यांच्या ‘अर्ध्या वाटेवर’ या विविध ललित लेखांच्या संग्रहातील जीवन – मृत्यूचा दोलोत्सव —

वसंत यायचा आहे आणि शिशिर सरलेला आहे. काळाच्या लयबद्ध गतीतून अगदी स्पष्ट जाणवतो आहे हा सांधा!जणू एक पाऊल उचलले आहे, दुसरं टेकायचं आहे- यांच्यामधला एक अधांतरी तरी क्षण!

अरुणा ढेरे यांनी या होळीच्या सणाची सांगड मातीशी जोडली आहे. हा काळ गर्भाधानाचा! एका वर्षातून दुसऱ्या वर्षाचा जन्म!

आपल्यातून नव्हे तर आपली नाळ जिच्याशी जोडली आहे त्या त्या मातीतून बीज रुजते. शिशिराच्या विनाशातून पुन्हा वसंतात फुलून उठणार आहे ही माती! गर्भिणी होणार आहे! सृष्टीची वासनाच जणू पेटलेली! तिचा प्रतीक सरळ उभ्या सोटासारखं झाड आणि वर धान्याची पुरचुंडी, आणि आंब्याचे तोरण!होळीच्या सणाचा संबंध सुफलनाशी आहे! विधीपूर्वक होळी पेटवून तिची पूजा करणे म्हणजे सृष्टीतल्या कामाग्नीचीच  पूजा करणे होय. कारण या अग्नीतून सृष्टीची नवनिर्मिती आहे. होळीतील स्त्री-पुरुषांचा एकत्र वावर थोडा  सैलावलेला असतो. कोळीणी डोक्यावरच्या मडक्या मध्ये दिवा पेटवून मिरवणुकीने होळी कडे जातात आणि त्या मडक्यांचा आहेर होळीला देतात माहेरवाशीण म्हणून! जणू ते आत दिवा असलेलं मडकं म्हणजे आपलंच गर्भाशय! होळी फाल्गुनात येते. सूर्य पौरुषाचे प्रतीक! हा काळ सृष्टीच्या बीजधारणेचा काळ! हा बीज धारणे चा उत्सव म्हणजे होळीचा उत्सव असतो!

सृष्टीची ही मिलनोत्सुक काम मोहित अवस्था संस्कृतीच्या विकासात आपोआप स्वीकारली गेली. पुढे स्त्रियांच्या वर्चस्वातून  पुरुषांच्या वर्चस्वाकडे संस्कृतीचा प्रवास झाला आणि प्रतीकात्मक विधि उरले!

एकीकडे होळीत मिसळत गेला राधा कृष्णाच्या प्रीतीचा एक रंग! कृष्ण विष्णु रूप आहे आणि विष्णू हाच स्वयम् काम आहे! म्हणून प्रणयाचा खेळ कृष्ण खेळतो. तो आमचा लोकसखा आहे. नाना रूपांनी तो प्रकट होतो. सगळे प्रापंचिक सुखदुःख विसरून प्रेमाच्या एका विराट रंगपंचमीत कृष्णानं सर्वांना भिजवून टाकलं! राधेला भिजवलं पण मनोमन राधा होणाऱ्या प्रत्येकाला  भिजवलं! व्यक्तिगत आणि सामूहिक प्रेमाचा एक अद्भुत रंग कृष्ण सहजतेने खेळला! बालपणीच दुष्ट पूतना राक्षसीचा त्याने प्राण घेतला, त्या प्रसंगाची आठवण म्हणजेच होळी! अभद्रावर भद्रा ने केलेली मात म्हणजे होळी!

होळी हा अमंगलाच्या मरणाचा उत्सव आहे. जीवनाच्या जयाचा उत्सव आहे. बंगाल मध्ये झोपाळ्यावर झुलतो कृष्ण आणि होळीचा ‘दोलोत्सव’ होतो हे जीवनाचं आंदोलणं आहे. उत्तर भारतातील रंगाची होळी राधा कृष्णाच्या प्रेम रंगाची आठवण म्हणून खेळली जाते.

जन्म आणि मृत्यूच्या मध्ये जीवनाने घेतलेला  एक  सुंदर झोका म्हणजे होळी! शिशिर आणि वसंताच्या मध्ये काळाने घेतलेला झोका म्हणजे होळी! वासना आणि प्रीती यांच्यामध्ये संस्कृतीने घेतलेला झोका म्हणजे होळी!

अरुणा ढेरे यांनी होलिकोत्सवाच्या संदर्भात लिहिलेले  ‘होळी’ सणाचे रूप मनोमन पटले! म्हणून  त्यांच्या लेखाचा  हा संक्षिप्त शब्दरूप भाग!

© सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – पुस्तकांवर बोलू काही ☆ ‘स्वानंद’ – श्री अवधूत जोशी ☆ श्री सुहास रघुनाथ पंडित

श्री सुहास रघुनाथ पंडित

 ☆ पुस्तकांवर बोलू काही ☆ ‘स्वानंद’ – श्री अवधूत जोशी ☆ श्री सुहास रघुनाथ पंडित  ☆ 

पुस्तकाचे नाव           : स्वानंद

लेखक                     : श्री अवधूत जोशी, मिरज.

मुद्रक व प्रकाशक    : परफेक्ट प्रिंटर्स.

यंत्रांच्या खडखडाटात बोललेले शब्दही ऐकू येणार नाहीत अशा इंजिनियरींग व्यवसायात अडकलेल्या श्री.अवधूत जोशींना शब्दांचे वेड कसे लागले कुणास ठाउक ? आपली मूळ आवड जोपासत त्यानी त्यातून आनंद मिळवला आणि तो स्वतः एकट्याने चाखण्यापेक्षा सर्वांनाच त्यात सामावून घ्यावं या हेतूने त्यांनी त्याला पुस्तकाचं स्वरूप प्राप्त करून दिल.त्यामुळे ‘ स्वानंद’ हे शिर्षक अगदी योग्यच वाटते.

पुस्तक उघडल्यावर दिसते ती अर्पणपत्रिका.श्री.पु. ल. देशपांडे आणि व्यंकटेश माडगूळकर यांची नावे वाचून जरा आश्चर्यच वाटलं.पण पुस्तक वाचून झाल्यानंतर मात्र अर्पणपत्रिका योग्यच आहे असं वाटलं. कारण  या

पुस्तकात ग्रामीण पार्श्वभूमी असलेल्या कथा आहेत, व्यक्तीचित्रणे आहेत.त्याचबरोबर शहरी मध्यम वर्गीयांची सुखदुःखे आणि स्वप्ने  सुद्धा चित्रित झाली आहेत. त्यामुळे या दोन्हीःचा संगम साधताना पु.ल. आणि व्यंकटेश माडगूळकर यांसारख्या दोन्ही महातिर्थांपुढे नतमस्तक होणे अगदी स्वाभाविक आहे.

‘स्वानंद’ मध्ये काय आहे ? यात साधारणपणे सात कथा, दोन विनोदी लेख, एक व्यक्तीचित्र,

आणि दोन ललित लेख आहेत. संमिश्र प्रकार असल्यामुळे प्रत्येक नव्या कथेत, लेखात नाविन्य वाटते.

श्री.जोशी यांच्य लेखनशैलीचे  वैशिष्ट्य काय ?

मुख्य म्हणजे सूक्ष्म निरीक्षण हे त्यांच्या लेखनाचे खास वैशिष्ट्य म्हणावे लागेल.उदा ‘शेवटी एकटाच’ या कथेची सुरूवात  ; ‘ माझं काय चुकलं’? मधील मुलांचे खेळ व दुपारची वेळ यांचे वर्णन हे सर्व सूक्ष्म निरीक्षणामुळेच शक्य झाले आहे.साधी,सोपी व छोटी वाक्य रचना त्यांनी अगदी सहजपणे साधली आहे.मुद्दाम अलंकारीक  भाषा वापरण्याचा मोह त्यांनी टाळला आहे. मात्र अनेक ठिकाणी सहज सुलभ उपमा मात्र त्यांनी दिल्या आहेत.उदा.’ सफर खाद्यनगरीची”या लेखातील हे वाक्य पहा.

“बटाटा तर नववधूप्रमाणे सकाळी हळद खेळून जेवणात भाजी बनून येतो तर संध्याकाळी डाळीच्या पिठाच्या पूर्ण वस्त्रात लपेटला जाऊन वडा म्हणून समोर येतो.”

श्री. जोशी यांची भाषा विनोदप्रचूर आहे.ती खदखदून हसवणार नाही पण वार्याची झुळूक यावी त्याप्रमाणे त्यांचा नर्मविनोद मनाला गुदगुल्या करतो.मानवी स्वभावाच्या  वर्मावर बोट ठेवण्याच विनोदी लेखकाचं वैशिष्ट्य त्यांना साधलं आहे.काव्य हा आपला प्रांत नव्हे असं जरी ते एके ठिकाणी म्हणत असले तरी त्याच्या चारोळीवरील  लेखातून त्यांची काव्यप्रतिभा दिसून येते.केवळ एक झलक म्हणून एक रचना:

‘सचिनच्या बॅटला नमस्कार करते वाकून

सौरभरावांच नाव घेते चार गडी राखून ‘

या  कथासंग्रहात कष्टकरी,मध्यमवर्गीय,सरळमार्गी साध्या माणसांच्या कथा आल्या आहेत.बालपणीच्या आठवणी आहेत.तारूण्याची स्वप्ने आहेत.उपदेशाची भाषा न वापरता त्यांच्या कथा काय सांगायचं ते सांगून जातात.पुस्तकाचं मुद्रण,मांडणी,अक्षर,मुखपृष्ठ

असं अंतरंग बहिरंग आकर्षक.श्री.अवधूत जोशी यांचा हा पहिला प्रयत्न आहे.त्यांच्याकडून आणखी  लेखन अपेक्षित आहे.त्यासाठी शुभेच्छा.

©  श्री सुहास रघुनाथ पंडित

सांगली (महाराष्ट्र)

मो – 9421225491

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares