आज एक खूपच वेगळी मूर्ती दाखवणार आहे. बहुधा कुणी पाहिली नसावी.
ही मूर्ती चेन्नई आय्.आय्.टी. जवळ, “मध्य कैलाश” नावाच्या मंदिरात आहे. ही मूर्ती फारशी जुनी नाही. अंदाजे पन्नास वर्षांपूर्वीची आहे.
उजवा भाग ‘गणपती’ आणि डावा भाग ‘मारुती’ अशी असणारी ही विलक्षण मूर्ती आहे. उजव्या वरच्या हातात ‘अंकुश’, तर खालच्या हातात ‘तुटका दात’, आणि डावीकडचा हात ‘गदा’ धरून आहे. डोक्यामागून ‘शेपूट’ डोकावते.
या मूर्तीला “अध्यन्त प्रभू” म्हणून ओळखतात. मंदिराच्या विश्वस्तांना स्वप्नात याच रूपात दर्शन मिळाले, म्हणून तशी मूर्ती बनवली गेली.
शक्ती आणि बुद्धी यांचा संगम असलेली ही अभिनव कलाकृती आहे….
संग्राहक : सुश्री शैला मोडक
≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈
विष्णूचे प्रतीक म्हणून शाळीग्रामची पूजा केली जाते.
नेपाळमध्ये पशुपतीनाथापासून साधारणतः १५० कि.मी. अंतरावर असलेल्या मुक्तनाथ येथे गंडकी नदीमध्ये ‘शाळीग्राम’ नावाचे दगड सापडतात. त्याशिवाय या ठिकाणी अशा दगडांचा मोठा डोंगरच असून या दगडापासून मूर्तीसुद्धा तयार करण्यात येतात तसेच या दगडांवर यंत्रे कोरण्याची प्रथाही प्रचलित आहे.
विशिष्ट प्रकारची चक्रे आणि मुखे यावरून या दगडांची परीक्षा केली जाते.
या दगडावर लहानशी सोन्याची रेखाही असते.
शाळीग्राम कसा तयार होतो याविषयी एक कल्पना सांगितली जाते, ती अशी हरिपर्वताच्या पायथ्याशी चक्रतीर्थ नावाचे एक सरोवर असून त्या सरोवरात शाळीग्रामाचा दगड एक हजार वर्षे राहिल्यानंतर श्रीविष्णू वज्रकीर या किड्याच्या रुपाने त्यात शिरून तेथे चक्राची आकृती कोरतो. अशा शाळीग्रामांचे निरनिराळे प्रकार असून त्यावरून त्यांना वेगवेगळी नावे दिलेली आहेत. ती पुढीलप्रमाणे—–
१) शुभ्र – वासुदेव
२) निळा -हिरण्यगर्भ
३) काळा – विष्णू
४) तांबडा – प्रद्युम्न
५) गडद हिरवा – श्रीनारायण
६) गडद निळा – नरसिंह किंवा वामन
७) बारा चक्रे असलेल्या शाळीग्रामाला अनंत हे नाव प्राप्त झाले आहे.
शाळीग्रामाचे असे ८९ प्रकार सांगितलेले आहेत. शालिग्रामचे निरनिराळ्या प्रकारानुसार त्याचे उपयोग —
१) वामन शाळिग्राम – हा छोटा आणि गोलाकार दगड असतो. या शाळिग्रामची उपासना केल्यास अहं, काम, क्रोध यासारख्या विकारांमधून मुक्ती मिळते.
२) अनंतक शाळिग्राम – विविध रंग-रुप आणि ज्यावर नागाच्या फणासारखे चिन्ह असतात. या शाळिग्रामची उपासना कुटुंबाला संकटापासून वाचवणारी तसेच दरिद्रता दूर करणारी मानली गेली आहे.
३) कृष्ण शाळिग्राम – गोलाकार आणि मागील भाग झुकलेला असतो. या शाळिग्रामची उपासना केल्यास श्रीकृष्णाप्रमाणे ज्ञान आणि विवेकतेच्या बळावर यश प्राप्त होते.
४) कूर्म शाळिग्राम – निळा रंग, तीन रेषा आणि बिंदूने अंकित असते ही शीळा. या शाळिग्रामची पूजा शांती, धैर्य, सुख, ताकद प्रदान करणारी मानली गेली आहे.
५) वराह शाळिग्राम शीळा – विषम आकार आणि मध्ये दोन चक्राचे चिन्ह असणारी ही शीळा लवकर लक्ष्य आणि कार्यसिद्धी करून देणारी आहे.
६) हयग्रीव शाळिग्राम शीळा – या शिळेवर पाच रेषा आणि अंकुशाचा आकार असतो. भगवान विष्णूच्या हयग्रीव अवताराप्रमाणे ही शीळा संकटमोचक आहे.
७) दामोदर शाळिग्राम – निळा रंग आणि यामध्ये निळ्या रंगाची चक्रकार शिळा, याच्या केवळ दर्शनाने जीवनात चमत्कारिक बदल घडून येतात
८) लक्ष्मीनारायण शाळिग्राम – दोन चक्र असलेल्या या शिळेची उपासना वैभव आणि शांती प्रदान करणारी आहे.
९) मत्स्य शाळिग्राम शिळा – ही शिळा कमळाच्या आकाराची असते. या शाळीग्रामची पूजा केल्याने अमाप धन, सुख व
अपत्याची इच्छा पूर्ण होते.
दक्षिणेतल्या बर्याच विष्णू मंदिरामधून विष्णूच्या गळ्यात शाळीग्रामांची माळ घातलेली असते.
माध्व संप्रदायाचे वैष्णव लोक शाळीग्रामाला प्रत्यक्ष विष्णूच्या मूर्तीपेक्षाही श्रेष्ठ समजतात. पंचायतन पूजेतही विष्णूचा प्रतिनिधी म्हणून शाळीग्रामच असतो.
माध्व लोक प्रायश्चितासाठी पंचगव्याऐवजी शाळीग्रामाचे तीर्थ घेतात. शाळीग्रामात विश्वातील सर्व पूज्य वस्तूंचा अंतर्भाव होतो. शाळीग्राम फुटला तरी अपूज्य ठरत नाही.
शाळीग्रामाविषयी पद्मपुराणात एक कथा सांगितली आहे ती अशी ——
विष्णूने नवग्रह निर्माण केले आणि माणसाचे बरे वाईट करण्याचे काम त्यांच्यावर सोपवले. शनि या पापग्रहाला हे सामर्थ्य मिळताच तो ब्रह्मदेवाच्या राशीलाच गेला. ब्रह्मदेवाने त्याला विष्णूकडे पाठविले. विष्णू घाबरला आणि त्याने शनिला ‘उद्या ये’ असे सांगितले. दुसर्या दिवशी शनि गेल्यावर विष्णू जागेवर नाही. शोध घेतला असता विष्णू गंडकी शीळेचा पर्वत होऊन राहिल्याचे समजले. शनिने वज्रकीट नावाच्या किड्याचे रुप घेतले आणि पर्वताच्या पोटात शिरून पोखरू लागला. विष्णूला हे पोखरणे सहन होईना त्याच्या अंगातून घामाच्या धारा बाहेर आल्या. त्याच्या पुढे कृष्ण गंडकी व श्वेत गंडकी म्हणून दोन नद्या झाल्या. बारा वर्षानंतर विष्णू शनिच्या त्रासातून मुक्त झाला. त्याने निजरुप घेतले. आपले प्रतीक म्हणून गंडकीतल्या शाळीग्रामांची लोकांनी पूजा करावी असे त्याने सांगितले.
शालिग्राम
★याला स्वयंभू मानले जाते.
★यांची प्राण प्रतिष्ठा करण्याची गरज नसते.
★कोणताही व्यक्ती हे घरात किंवा मंदिरात स्थापित करुन पूजा करु शकतो.
-शाळीग्राम वेगवेगळ्या रुपांमध्ये मिळते. काही अंडाकार असतात तर काहींमध्ये छिद्र असतात. या दगडामध्ये शंख, चक्र, गदा किंवा पद्मने खुणा तयार केलेल्या असतात.
संग्राहक – सौ.अंजली दिलिप गोखले
मो 8482939011
≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈
☆ जेव्हा टायटॅनिक स्वत: आपली दिशा बदलू पाहतं – सुश्री मनीषा कोठेकर☆ संग्राहक – श्री सुनीत मुळे ☆
स्त्रियांच्या स्थितीत बदल होऊन आपण खूप पुढे आलो आहोत.तरी देखील अजून स्त्रियांचे प्रश्न सुटले आहेत असे म्हणता येत नाही. नवनवीन समस्या आपल्यासमोर येतच आहेत. अशावेळी आजच्या स्त्रीची नेमकी स्थिती काय हे जाणून घेणे याची गरज भासते.
समाज हे एका अर्थी टायटॅनिक सारखे अवाढव्य आकाराचे जहाजच. त्याची दिशा बदलायची तर बाहेरून खूप मोठी शक्ती(external force ) लावायला हवी. मात्र ज्यावेळी टायटॅनिकच्याच प्रत्येक कणाला आपली दिशा बदलावी असे वाटते व ते सर्व मिळून प्रयत्न करतात तेव्हा कुठल्याही बाह्यशक्ती विनाही हे सहज शक्य होऊ शकतं.
असाच एक प्रयोग महिलांसंबंधीच्या अध्ययनाबाबत झाला . ‘भारतातील महिलांची स्थिती ‘ हे भारतातील महिलांच्या स्थितीचा वेध घेणारे देशव्यापी अध्ययन नुकतेच महिलांच्या संबंधी कार्य करणा-या ‘दृष्टी स्त्री अध्ययन प्रबोधन केंद्र’ द्वारा करण्यात आले.
भारत हा सर्वदृष्टीने विविधतेने नटलेला देश. संस्कृती, भाषा, शैक्षणिक -सामाजिक -आर्थिक स्थिती, समस्या या सगळ्यांच्या वेगवेगळया. अशा वेळी महिलांच्या स्थितीचे आकलन करावयाचे म्हणजे सगळ्या प्रकारच्या स्थितीतील महिलांपर्यंत पोहोचणे व त्यांची स्थिती जाणून घेणे गरजेचे होते. शिवाय अशाप्रकारचे अध्ययन खूप काळ सुरू राहिले तर ते कालबाह्य किंवा असंगत होऊ शकते .त्यामुळे कमीत कमी वेळात एवढे प्रचंड मोठे सर्वेक्षण करावयाचे तर त्यासाठी तेवढेच मनुष्यबळही गरजेचे. आज भारतातील विविध संघटनांमध्ये कार्यरत महिला कार्यकर्त्यांची संख्या प्रचंड आहे. या कार्यकर्त्यांनी निर्णय केला की आपण हे काम करावे. यापैकी अनेक संघटनांचे कार्य देशव्यापी आहे, त्यामुळे त्यांच्या माध्यमातून देशातील कानाकोपऱ्यात पोहोचून महिलांची स्थिती व त्यांच्या समस्या जाणून घेणे शक्य होते.
शिवाय कार्यकर्त्यांच्या द्वारे सर्वेक्षण होणार म्हटल्याने त्या क्षेत्राची त्यांना नीट माहिती होती. स्थानिक कार्यकर्ते असल्याने भाषेचा अडसर नव्हता. या सगळ्यांनी हा अध्ययनाचा ‘द्रोणागिरी पर्वत’ उचलून धरला.
अध्ययनाचे केंद्र नागपूर ठरले.वेगवेगळया प्रकारच्या समित्या ठरल्या. प्रकल्प संचालक म्हणून डॉ.मनीषा कोठेकर वर जबाबदारी दिल्या गेली. एक तज्ञांची एक केंद्रीय समिती स्थापण्यात आली व त्यांच्या मार्गदर्शनाखाली हे काम पूर्ण करण्यात आले.
देशभरात सर्व २९ राज्ये व ५ केंद्रशासित प्रदेश व ६४% जिल्ह्यांमध्ये हे सर्वेक्षण झाले.यात आंतरराष्ट्रीय सीमावर्ती जिल्हे देखील मोठ्या प्रमाणात होते. साधारण ६००० महिला कार्यकर्त्यांनी यात भाग घेतला. ८०,०००हजाराच्या जवळपास महिलांच्या मुलाखती घेऊन सर्वेक्षणाचे काम पूर्ण केल्या गेले.
२०१६ मधे अध्ययनासंबंधी निर्णय झाला व १७ मधे कामाची पूर्ण आखणी होउन १८ मधे सर्वेक्षणाचे काम पूर्ण झाले.त्यानंतर डाटाएन्ट्री , त्याचे विश्लेषण ,रिपोर्ट लिहिणे व छपाई हे संपूर्ण काम नागपूरातून झाले.२४ सप्टेंबर २०१९ला दिल्लीला प.पू.सरसंघचालक मा.मोहनजी भागवत,मा.निर्मला सितारामन व मा.शांताक्काजींच्या प्रमुख उपस्थितीत या अध्ययनाचे दोन खंड,executive summery व महिलांच्या विशिष्ट स्थितीवरील अध्ययनावरील २६ पुस्तकांचे विमोचन झाले.
महिलांना जेव्हा आपली स्थिती बदलावी असं स्वत: वाटतं व त्या एकसुराने आणि एकदिलाने काम करायचे ठरवतात तेव्हा स्थिती बदलण्याच्या दिशेने त्यांनी टाकलेले ते दमदार पाऊल असतं अन् मग त्यांना त्यांच्या मार्गावर मार्गक्रमण करण्यासाठी कुणीही थांबवू शकत नाही .
ले. : मनीषा कोठेकर
संग्राहक : सुनीत मुळे
≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈
एकदा एका राजाने आपल्या तीन मंत्र्यांना, “ तुम्ही जंगलात जाऊन एक एक पोते भरून फळे घेऊन या “, असा आदेश दिला.
पहिल्या मंत्र्याने विचार केला की, प्रत्यक्ष राजानेच आपल्याला फळे आणायला सांगितली आहेत, म्हणून आपण चांगल्या प्रतीचीच फळे घेऊन गेले पाहिजे. त्याप्रमाणे त्याने चांगली फळे शोधून घेतली.
दुसऱ्या मंत्र्याने विचार केला की, राजाने सांगितले आहे तर खरे, पण राजा तर इतर कामात इतका व्यस्त असतो की, तो कशाला एक एक फळ तपासून पाहणार आहे? म्हणून त्याने मिळतील ती चांगली वाईट फळे आणली.
तिसऱ्या मंत्र्याने विचार केला की, राजा कशाला पोते उघडून पाहणार आहे की, त्यात फळे आहेत की आणखी काही ? तो तर बाहेरून फक्त पोत्याचा आकार पाहील, म्हणून त्याने जंगलात न जाताच पाला पाचोळा आणि फळांच्या आकाराचे दगड धोंडे भरून आणले.
दुसऱ्या दिवशी तिघेही मंत्री आप आपली पोती घेऊन दरबारात हजर झाले. फळे काय आणि किती आणलीत हेही न पाहता राजाने प्रधानजींना आदेश दिला की, या तिघांनाही राज्यात तीन वेगवेगळ्या ठिकाणी एक महिना स्थानबद्ध करण्यात यावे आणि त्यांनी जमा करून आणलेल्या फळां व्यतिरिक्त इतर आहार त्यांना देण्यात येऊ नये.
पहिल्या मंत्र्याने चांगली फळे जमा केली होती, त्यामुळे त्याने चांगली फळे खात खात एक महिना मजेत घालवला.
दुसऱ्या मंत्र्याने जी काही चांगली फळे जमा केली होती त्यावर थोडे दिवस चांगले घालवले पण पुढे कच्ची आणि सडलेली फळे खावी लागल्यामुळे तो आजारी पडला.
तिसऱ्या मंत्र्याने दगडधोंडेच जमा करून ठेवल्यामुळे त्याची तर पहिल्या दिवसापासूनच उपासमार झाली.
तात्पर्य :~
चांगल्या वाईट कर्माचे फळ योग्य वेळ येताच त्याच्या त्याच्या कर्त्याला न चुकता शोधून काढते.
संग्रहिका : सुश्री लता गाडगीळ
≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈
एकवीरा आईचे मंदिर हे महाराष्ट्रातील लोणावळा या गावाजवळ कार्ला या लेण्यांजवळ आहे..
कार्ला निवासीनी शक्तीदायीनी श्री एकविरा देवी आई महाराष्ट्राची आराध्य कुलदेवता, हाकेला धावणारी, नवसाला पावणारी आई एकविरा देवी म्हणजेच आदिमाता रेणुका.. परशुरामाची माता…
जगप्रसिद्ध कार्ला लेणीच्या तोंडाशी असणारे एकविरा देवीचे मंदिर म्हणजे कोळी बांधवांबरोबरच तमाम महाराष्ट्राचे श्रद्धास्थान… या देवीची मूर्ती ही स्वयंभू असून हे देवस्थान पांडवकालीन असल्याचे मानले जाते… आई एकविरेचे स्थान कार्ला गडावर स्वयंभू असून अतिशय प्राचीन आहे. आईची मूर्ती स्वयंभू तांदळा दगडात प्रगटलेली “शेंदूर चर्चित” आहे.. लेण्यांमध्ये असलेले तिचे स्थान हे मंदिराचे वेगळेपण.. प्राचीनता आणि तिचे लोभस रूप यामुळे या देवीचे महत्व काही वेगळेच आहे..
आपण मंदिरात प्रवेश केल्यावर प्रथम आपल्या नजरेस पडतो आईचा चांदीचा नक्षीदार गाभारा.. ते नयनरम्य नक्षीकाम पाहून मन मोहून तर जातेच पण आईचे लोभस रूप पाहून आपण आपलेच राहत नाही.. ते लोभस तेजस्वी रूप डोळ्यात साठवत डोळ्यातून अश्रू कधी वाहू लागतात ते समजतही नाही.. तेजस्वी नेत्र असलेल्या या देवीच्या मुखमंडलावरील हास्य व ते प्रसन्न रुप पाहून मन अगदी उल्हासित होतं. मनात नवीन चैतन्यं निर्माण होतं..
शारदीय नवरात्रोत्सवाची सुरुवात होताच वातावरणात एक वेगळीच उर्जा सामावल्याची अऩुभूती होते. एका अद्वितीय शक्तीचा जागर या नऊ दिवसांमध्ये केला जातो.
नवरात्रीच्या नऊ दिवसांत एकविरा मातेच्या दर्शनासाठी रोज हजारो भाविक दर्शन घेण्यासाठी व देवीचा नवस फेडण्यासाठी येतात.
!! एकविरा आई तू डोंगरावरी
नजर हाय तुझी कोल्यांवरी !!
असे म्हणत आराध्य दैवत असलेल्या आणि नवसाला पावणारी म्हणून कोळी समाजात एकविरा देवीचं स्थान पूजनीय आहे…नवसाला पावणारी कोळी बांधवांचे आराध्य दैवत असणारी देवी..
देवळाच्या भोवती निसर्ग सिध्दहस्ताने वंदन करत आहे. कोळी आणि आगरी समाजाची कुलदेवता म्हणून देवीची महती असली तरी सर्वच भाविकांची ती स्फूर्तीदेवता आहे..
डोंगरातलं स्थान, प्रसन्न रूप, जागरूक देवस्थान आणि नवसाला पावणारी देवी म्हणून महत्व असलेल्या या देवीचं लोभसवाणं रूप प्रत्येक भक्ताने एकदा तरी डोळ्यात साठवून घ्यायलाच हवे.. नव्या उमेदीने जगण्यासाठी आई एकविरेचे दर्शन व परिसरातील निसर्ग- सौंदर्याने आपले मन प्रफुल्लित होऊन जाते हे मात्रं निश्चितच…
संग्रहिका – सुश्री संगीता कुलकर्णी
लेखिका /कवयित्री
ठाणे
9870451020
≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈
भक्तांची अगाध श्रद्धा बघुन देव – दिकांना, स्व:स्थान सोडून भक्ताकडे धाव घेतली, यातीलच एक पौराणिक कथा म्हणजे पुणेनिवासीनी चतु:शृंगी ही देवी आहे.
इसवी सन ६१३ मध्ये पुणे येथे फक्त दहा-बारा घरे असल्याचा उल्लेख सापडतो. राष्ट्रकूट वंशातील कृष्ण राजा याने तयार केलेल्या दानपत्रामध्ये (इ.स. ७५८) या शहराचे नाव ‘पुण्य विषय’ असे असल्याचे आढळते. पुढे त्याचे ‘पुनक विषय’ झाले. आणि इ. स. ९९३ मध्ये ते ‘पुनवडी’ झाल्याचा उल्लेख आहे. त्यानंतर ते पुणेश्वर मंदिरामुळे ‘पुणे’ असे झाले असावे. एकंदर पुणे नावविषयी अशा आख्यायिका आहेत.
चतु: शृंगी पुण्यात कशी आली ती कथा पुढे आहे.
नाशिक जवळच्या वणीचे म्हणजेच सप्तश्रुंगीदेवीचे पुण्यातील स्थान म्हणजे चतु:श्रुंगी. सप्तश्रुंगनिवासिनी ही साडेतीन शक्तीपीठांपैकी एक व अनेकांची कुलस्वामिनी.
पुण्यात विद्यापीठ परिरसरात सेनापती बापट रस्त्यापासून सुमारे दीडशे फूट उंच चढून गेल्यावर चतु:शृंगी मातेचे विलोभनीय दर्शन होते. चतु:शृंगी माता स्वयंभू व जागृत असून ती नवसाला पावते, अशी भक्तांची श्रद्धा आहे.
या मंदिरासंदर्भात एक आख्यायिका सांगितली जाते.
पेशव्यांचे पुण्यातील एक सावकार दुर्लभशेठ पीतांबरदास महाजन हे देवीचे परमभक्त होते. दरवर्षी ते नाशिकजवळील श्रीसप्तशृंगी गडावरील देवीच्या यात्रेस जात असत. कालमानाने ते अतिशय वृद्ध झाले व वारी चुकणार असे त्यांना वाटू लागले व ते अतिशय दु:खी झाले. तेव्हा श्रीसप्तशृंगी देवी त्यांच्या स्वप्नात आली व पुण्याच्या वायव्येस असलेल्या डोंगरावर आपण वास्तव्यास असल्याचे त्यांना सांगितले. त्याप्रमाणे त्यांना या डोंगरावर देवीचे स्वयंभू स्थान आढळले.परंतु वेळेआधीच दुर्लभशेठ देवीने सांगितलेल्या ठिकाणी पोहोचले तेंव्हा देवी पूर्ण प्रकट झालेली नसून तीन हात व चेहेराच प्रकट झाल्याचे त्यांना आढळून आले. हे स्थान म्हणजेच चतु:श्रुंगी होय. अर्थातच या स्थानी दूर्लभशेठने मंदिर बांधले.
वणीची सप्तशृंगी येथे अवतरली सप्तशृंगी देवीच्या मंदिरापाशी डोंगराची सात शिखरे होती असे म्हणतात. आता तेथे चारच शिखरे दिसतात म्हणून या देवीला चतु:शृंगी’ हे नाव मिळाले
पुणे शहरातील नरपगीर गोसावी यांना देवी प्रसन्न झाल्यामुळे त्यांनी तेथे सभामंडप, पायऱ्या व विहीर बांधली.
हनुमान जयंती चैत्री पौर्णिमा शनिवार, पूर्वा नक्षत्र शके १६८७ हा देवीचा प्रकटदिन आहे. चैत्र पौर्णिमेचा हा विशेष दिवस देवीचा प्रकट दिन म्हणून दरवर्षी मोठ्या श्रद्धेने साजरा केला जातो. मंदिराचा सभामंडप, धर्मशाळा, पाय-या, विहीर, रस्ते, दागदागिने हे सर्व भक्तांनी श्रद्धेने अर्पण केले आहे.
चतु:शृंगी मंदिराच्या परिसरात गेल्या कित्येक वर्षापासून नवरात्रीत मोठी जत्रा भरत असे, ती कोजागिरी पौर्णिमेपर्यंत चालत असे.
पुण्यात उत्तर पेशवाईत दुर्लभशेठने नाणी पाडण्याचा म्हणजेच टाकसाळीचा मक्ता घेतला होता, तसेच नाशिकजवळही दूर्लभशेठची एक टाकसाळ होती. दूर्लभशेठने पुण्यात एक धर्मशाळा बांधली व तेथे कालियामर्दनाची मूर्ती स्थापन केली.
*लक्ष्मीरस्त्यावर सतरंजीवाला चौकानजीक ही मूर्ती आजही पाहायला मिळते. चतु:श्रुंगी हे पूर्वीपासून पुणेकरांचे श्रद्धास्थान राहिले आहे. नवरात्रात गावातून तालीमबाज नारळाचे तोरण घेऊन चतु:श्रुंगी येथे पहाटे पळत जात असत. आता तालीमबाज व पळत जाणे बाजूला पडले असले, तरी आजही पुण्याच्या पेठांमधून चतु:श्रुंगीला तोरण वाहण्याची प्रथा सुरू आहे.
चतु:श्रुंगीचे दुसरे एक मंदिर रविवार पेठेत आहे हे मात्र थोडक्याच जणांना माहित असेल. सुमारे २०० वर्षांपूर्वी किसनदास राजाराम यांनी येथे देवीची स्थापना केली व बढाई समाजाने मंदिर बांधले. येथे देवी तांदळा स्वरूप आहे. सुभानशा दर्ग्याच्या चौकातून गोविंद हलवाई चौकाकडे जाऊ लागले की उजव्या बाजूस हे मंदिर आहे.
अशी चतु:शृंगी देवीची पौराणिक कथा आहे.
संग्राहक : सुश्री शैला मोडक
≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈