मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ ।। श्री नारद उवाच ।। – नारद भक्ति सूत्रे —सूत्र ३० ☆ श्री संदीप रामचंद्र सुंकले ☆

श्री संदीप रामचंद्र सुंकले

? इंद्रधनुष्य ?

।। श्री नारद उवाच ।। – नारद भक्ति सूत्रे — सूत्र ३० ☆ श्री संदीप रामचंद्र सुंकले 

।। श्री नारद उवाच ।। 

नारद भक्ती सूत्र क्र. ३०.

स्वयंफलरूपतेति ब्रह्मकुमाराः ॥ ३० ॥

अर्थ : ब्रह्मदेवाचे पुत्र (सनकादिक तसेच नारद) भक्ती स्वयंफलरूप आहे असे म्हणतात.

विवेचन : भक्ती ही साधन मानली तर तिचे महत्त्व राहणार नाही. तसेच तिला ज्ञानादिकाचे साध्य मानले तरी पारतंत्र्य प्राप्त होते किंवा अन्योन्याश्रयत्व दोष प्राप्त होतो हे पूर्वीच्या सूत्रावरील विवरणात सांगितले आहे. ही दोन्ही मते नारदांना मान्य नसावीत म्हणून या सूत्रात नारद म्हणतात, ती स्वयंफलस्वरूप आहे.

भक्तीची स्वयंफलरूपता नारदांनी सूत्र सव्विसाव्यात ‘फलरूपत्वात्’ म्हणून सांगितलीच आहे. सनकादिक व नारद या उभय ब्रह्मकुमारांच्या मते भक्ती ही कोणाचे साध्य नाही व कोणाचे साधन नाही; ती स्वतःच फलस्वरूप आहे, तीच साध्य व तीच साधन आहे. ज्ञानाने भक्ती किंवा भक्तीने ज्ञान हे मत त्यांना मान्य नाही. ती स्वयंफलस्वरूपा कशी आहे याचे विस्तारपूर्वक विवरण, सव्विसाव्या सूत्रावर केले गेलेच आहे. कोणी म्हणेल की कोणते तरी साधन केल्याविना भक्ती तरी कशी प्राप्त होणार? कोणत्याही गोष्टीचा अनुभव घेतल्याशिवाय त्याबद्दल मत प्रगट करणे अन्यायकारक होऊ शकते. आपण नामस्मरण भक्तीचे उदाहरण पाहू. कोणतेही नाम घेताना, कोणालाही सुरुवातीला त्याचा कंटाळाच येतो, हा जवळजवळ सर्वांचा अनुभव असेल. पण श्रीयुत तुकाराम आंबिले यांना त्यांच्या गुरूंनी स्वप्नात नाम दिले. त्यांनी त्या नामाचा घोषा लावला….! न कंटाळता, न थकता, प्राप्त परिस्थितीचा स्वीकार करीत, अगदी भंडाऱ्याच्या डोंगरावर जाऊन नाम घेतले…..! शेवटी एक वेळ अशी आली की श्री. तुकाराम आंबिले यांचे #”आकाशा एवढ्या तुक्यात”# रुपांतरण झाले….! हे सर्व परिवर्तन निव्वळ नामस्मरणाने झाले असे संत तुकाराम महाराज यांचे चरित्र वाचले की लक्षात येईल.

सामान्य मनुष्याच्या अंगी असलेल्या उपजत *गुणां*मुळे त्याच्यात भगवद्विमुखता, विषयवासना, अश्रद्धा हे असे अनेक रोग असतात, त्यामुळे त्याला भक्तीमार्ग गोड लागत नाही. पूजेत, भजनात, ध्यानात आनंद होत नाही; रुची निर्माण होत नाही. याचे औषधही हेच आहे की नामस्मरण सतत करीत राहणे. ते नाम ते सर्व विकार दूर करते, हृदयशुद्धी होते. मग संत तुकाराम महाराज म्हणतात,

नाम घेतां मन निवे । जिव्हे अमृतचि स्रवे *होताती बरवे । ऐसे शकुन लाभाचे ॥०१॥ मन रंगलें रंगलें । तुझ्या चरणीं स्थिरावलें । केलिया विठ्ठलें । ऐसी कृपा जाणावी ॥०२॥ जालें भोजनसें दिसे । चिरा पडोनि ठेला इच्छे । धालियाच्या ऐसें । अंगा येती उद्गार ॥०३॥ सुख भेटों आलें सुखा । निध सांपडला मुखा तुका म्हणे ||०४||”

संदर्भ: अभंग क्रमांक ८८४, सार्थ तुकाराम गाथा धार्मिक प्रकाशन संस्था)

तुकाराममहाराजांनी प्रथम आपल्या वाणीस नाम घेण्याची प्रेरणा दिली.

“घेई घेई माझे वाचे | गोड नाम विठोबाचे || १ || 

डोळे तुम्ही घ्यारे सुख | पाहा विठोबाचे मुख || २ || 

तुम्ही आइका रे कान | माझ्या विठोबाचे गुण || ३ || 

मन तेथे धाव घेई | राही विठोबाचे पायी || ४ || 

तुका म्हणे जीवा | नको सोडू या केशवा || ५ ||”

– – संत तुकाराम महाराज सतत नामाच्या मागे लागले, मनात असेल किंवा नसेल पण वाचेवर नाम वसोदे, असा नामजप, भजन चालू झाले. मग त्यांना पुढील प्रमाणे अनुभव आला… 

“विषयीं विसर पडिला निःशेष । अंगीं ब्रम्हरस ठसावला ॥१॥ 

माझी मज झाली अनावर वाचा । छंद या नामाचा घेतलासे ॥२॥ 

लाभाचिया सोसें पुढें चाली मना । धनाचा कृपणा लोभ जैसा ॥३॥ 

तुका म्हणे गंगासागरसंगमीं । अवघ्या जाल्या ऊर्मी एकमय ॥४॥”

(संदर्भ: अभंग क्रमांक १०३५, सार्थ तुकाराम गाथा धार्मिक प्रकाशन संस्था)

– – नामस्मरण भक्ति करता करता श्री. तुकाराम आंबिले ते संत तुकाराम महाराज हा प्रवास सुलभतेने घडून आला……!

… “स्वयंफलरूपता“ म्हणतात ती हीच एक अलौकिक अवस्था आहे.

!! जय जय रघुवीर समर्थ !!

!! नारद महाराज की जय!!!

– क्रमशः लेख क्र. ६ 

© श्री संदीप रामचंद्र सुंकले (दास चैतन्य)

थळ, अलिबाग. 

८३८००१९६७६

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ “नाझ -ए -हिंद! अभिमान आहे!” ☆ श्री संभाजी बबन गायके ☆

श्री संभाजी बबन गायके

? इंद्रधनुष्य ?

☆ “नाझ -ए -हिंद! 🇮🇳 अभिमान आहे!” ☆ श्री संभाजी बबन गायके

नाझ-ए-हिंद! अभिमान आहे!

जगात आणि त्यातल्या त्यात भारतात सर्वाधिक धर्मनिरपेक्ष जर कुणी असेल तर ती भारतीय सेना. सेनेत जणू सबंध भारत नांदत असतो. एक सैनिक, एक सैन्याधिकारी त्याच्या कार्यकाळात भारताच्या जवळजवळ सर्वच राज्यांत, सीमांवर विविध राज्यांतून आलेल्या विविध अधिका-यांच्या नेतृत्वात सेवा बजावून निवृत्त होतो.

नेतृ या संस्कृत शब्दापासून तयार झालेल्या नेता या शब्दाचा एक अर्थ ‘धोका पत्करणारा’ असाही सांगितला जातो… अर्थात समूहाच्या अग्रभागी राहून, समुहावर येऊ घातलेले संकट जो प्रथम आपल्या शिरावर घेतो.. तो खरा नेता… नायक!

“शत्रूला माझ्या सैनिकांना इजा पोहोचवायचीच झाल्यास.. त्यांना प्रथम माझ्याशी दोन हात करावे लागतील… त्यात मी मरण पावलो तरच त्यांना माझ्या सैनिकांपर्यंत पोहोचता येईल! आणि मी माझ्या जवानांसाठी काहीही करू शकतो.. नव्हे करेन” असं छातीठोकपणे सांगणारा आणखी एक सेनानी भारतीय सेनेने अनुभवला… त्याची ही कथा! भारतीय सैन्याधिकारी त्यांच्या हाताखाली काम करणा-या जवानांना my boys म्हणतात… ते केवळ औपचारीकता म्हणून नव्हे… तर खरोखरीच संकटाच्या परिस्थितीत त्यांच्या मागे संरक्षक म्हणून उभे राहतात… हे सिद्ध करणारी!

बावीस ऑगस्ट, दोन हजार आठ… पहाटेचे साडेतीन वाजलेले आहेत… या दिवसाच्या सायंकाळी जम्मू-काश्मीरमध्ये तैनात ४५, राष्ट्रीय रायफल्सच्या अधिका-यांना एक पक्की खबर मिळाली आहे… पाकिस्तानी अतिरेक्यांचा एक मोठा गट सीमा ओलांडून भारतात प्रवेश करणार आहे! Insurgent म्हणजे प्रस्थापित सत्तेस धुडकावून त्या सत्तेविरुद्ध शस्त्र हाती घेतलेली व्यक्ती. या Insurgent विरुद्ध कारवाई करून त्याला नेस्तनाबूद करणे गरजेचे ठरते.. अन्यथा सत्ता धुळीस मिळायला वेळ लागत नाही. भारतात भारताची, भारतातल्या सर्वच्या सर्व भूभागावर एकछत्री सत्ता आहे.. आणि असेल. या सत्तेला कुणी आव्हान दिले तर ते आव्हान मोडून काढण्याच्या अखंडित मोहिमेला Counter-Insurgency अशी संज्ञा आहे.

अतिरेकी आपल्या सीमेच्या आत खोलवर येण्याआधीच त्यांना रस्त्यातच गाठायला त्यांना सामोरे जायचे आणि त्यांचा खात्मा करायचा… अशी सर्वसाधारण पद्धत असते. हे जणू एकप्रकारे मरणावर चालून जाण्यासारखेच. पण ही अशी चाल करून जाणेच भारतीय सैनिकांच्या अंगवळणी पडले आहे.

४५, राष्ट्रीय रायफल्सच्या अधिका-यांना या येऊ घातलेल्या अतिरेक्यांविरोधात मच्च्छल गावाजवळ, कुपवाडा सेक्टरमध्ये ‘नाव-नार’ नावाने एक मोहिम आखली. आपल्या कुटुंबियांसमवेत एक दीर्घ सुट्टी उपभोगून सैन्य तुकडीत नुकतेच परतलेले अनुभवी कमांडिंग ऑफिसर या मोहिमेत अग्रभागी राहून निघाले. साहेबांना प्रत्यक्ष सैनिकी कारवायांचा थोडाथोडका नव्हे तर तब्बल वीस वर्षांचा अनुभव होता. आपल्या नेतृत्वातील सैनिकांना स्वत:चे पुत्र मानणारे अधिकारी म्हणून या साहेबांची ख्याती होती. त्यांचे पिताजी सेनेत Honorary Captain होते. त्यांच्याच पावलांवर पाऊल टाकीत हे साहेब सेनेत अधिकारी म्हणून दाखल झाले होते… आणि त्यांच्या दोन भावांनी सुद्धा त्यांचाच कित्ता गिरवला होता… एकच कुटुंबातील चौघे पुरुष भारताच्या संरक्षण सेवेत होते!

त्या पहाटेचा अंधार अधिकच गडद होता. सावध पावले टाकीत आपली तुकडी पुढे पुढे सरकत राहिली… कर्नल साहेब त्यांच्यापुढे कुणालाही जाऊ देत नव्हते… इतक्यात समोरच्या झाडीत काही हालचाल दिसली… आणि एके-४७ मधून निघणा-या गोळ्यांचा चकचकाट त्या अंधाराला भेदून येऊ लागला… आपल्या सैनिकांनी प्रशिक्षणात शिकवल्यानुसार त्वरीत आपापल्या जागा घेतल्या… कर्नल साहेबांनी थेट पुढे घुसत त्यांची रायफल अचूक चालवली… दोन अतिरेकी त्यांच्या वर्षावात त्वरीत ठार झाले खरे… पण त्या अतिरेक्यांनी झाडलेल्या फैरीमध्ये (फैर=fire) साहेबांच्या शरीरात अनेक गोळ्या घुसल्या! साहेब जबर जखमी झाले… आणि कोसळले…. पण कोसळताना त्यांनी आणखी एक अतिरेकी पाहिला…. आधीच्या दोन अतिरेक्यांचे मुडदे पाहून त्या अतिरेक्याने डोंगर उतारावरील एका चिंचोळ्या जागेत आसरा घेतला आणि त्या सुरक्षित जागेवरून तो भारतीय सैनिकांवर जबरदस्त गोळीबार करु लागला! आपल्या सैनिकांना पुढे जाता येईना…. कर्नल साहेबांनी ही आणीबाणीची परिस्थिती जाणली…. प्रचंड जखमी अवस्थेत, एखादा जखमी वाघ चवताळून उठावा तसे साहेब उठले… तो अतिरेकी लपला होता त्या छोट्या डोंगराच्या दुस-याबाजूने वर चढले… आणि त्यांनी स्वत:ला त्या अतिरेक्याच्या दिशेने खाली लोटून दिले…. अगदी त्याच्या पुढ्यात जाऊन थांबले कर्नलसाहेब… त्या अतिरेक्याच्या समोर त्याचा मृत्यू साक्षात उभा होता….. कर्नल जोजन थॉमस साहेबांच्या रुपात! जोजन साहेब केरळमधील थिरुवला जिल्ह्यातील एका खेड्यात, कुट्टूर गावात २२ जुलै, १९६५ रोजी जन्मले होते. JOJAN हे JOHAN (जोहान) या शब्दाचे एक रूप आहे. जोहान चा अर्थ आहे देव दयाळू आहे! आणि Thomos हे प्रभू येशूच्या बारा शिष्यांपैकी एका शिष्याचे नाव होते. Jojan Thomos हे नाव धारण करणारा एक बहादूर सैनिक अधिकारी भारतीय सैन्याला लाभला, ही सुद्धा ईश्वरी कृपाच म्हणावी लागेल.

जोजन यांनी पदवी शिक्षण पूर्ण केल्यावर त्यांनी प्रवेश परीक्षा पहिल्याच प्रयत्नात उत्तीर्ण केली आणि चेन्नईच्या सैन्य अधिकारी प्रशिक्षण संस्थेत प्रशिक्षणार्थी म्हणून ते रुजू झाले. आणि मार्च १९८६ मध्ये त्यांनी देशसेवेत प्रथम पग.. पहिले पाऊल ठेवले!

 जोजन साहेबांना रेजिमेंट मिळाली ती ११, जाट रेजिमेंट. एक केरळी माणूस हरियाणवी सैनिकांच्या सोबत काम करू लागला… जगातल्या इतर कोणत्याही सैन्यात असे वैविध्य आढळत नाही सहसा. सेनेत जणू सारा भारत एकवटलेला असतो. एकेक पायरी पार करीत करीत जोजन साहेब आता कर्नल बनले होते… त्यांची कार्यशैली, उत्साह आणि कार्यक्षमता लक्षात घेऊन वरिष्ठांनी त्यांना 45 राष्ट्रीय रायफल्समध्ये डेप्युटेशनवर पाठवलं…. राष्ट्रीय रायफल्समध्ये देशाच्या विविध भागातील उत्तमोत्तम सैनिक, अधिकारी हेरून त्यांना कर्तव्यावर विशेष कामगिरीसाठी बोलावून घेतले जाते… आणि यासाठी अनेक सैनिक, अधिकारी उत्सुक असतात… कारण राष्ट्रीय रायफल्स जम्मू-कश्मीरमध्ये तैनात असल्याने इथे नेहमी शौर्य गाजवण्याची संधी असतेच! जोजन साहेबांनी मोठ्या उत्साहाने काश्मिरात पदार्पण केले!

काश्मीर म्हणजे काही एखाद्या हाऊसिंग सोसायटी नव्हे… सिमेंटची संरक्षक भिंत असलेली. प्रवेशद्वारावर एखाद-दोन रखवालदार नेमले की झाले! प्रचंड लांबीची भारत-पाक सीमा… घनदाट जंगल… लहरी हवामान… पाकिस्तानी लष्कराकडून प्रशिक्षण दिले गेलेले, अत्याधुनिक शस्त्रसज्ज आणि भारतद्वेषाने पेटून उठलेले माथेफिरू अतिरेकी, त्यात काही स्थानिकांचा पाठिंबा, राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय कायदे, संघटना, जनता यांच्यामुळे सैन्यबलाचा थेट वापर करण्यावर असलेल्या मर्यादा….. एक ना अनेक कारणे आहेत. इथे प्रत्येक फुटावर सैनिक उभे करणे अशक्य आहे… पण तरीही भारतीय सैनिक असेल त्या स्थितीत पाय रोवून उभे असतात… एखादा सैनिक धारातीर्थी पडला की दुस-याच क्षणी दुसरा सैनिक त्याची जागा घेत असतो…. माघार नाही घेत…. म्हणून कश्मीर आणि पर्यायाने भारत आपला आहे!

 २२ ऑगस्ट, २००८ रोजी जोजन साहेबांचे वय होते ४३ वर्षे १ महिना. पोटी दोन मुले होती.. एक मुलगी मेघना आणि चिरंजीव फिलेमॉन. पत्नी गृहिणी बीना. बेचाळीस वर्षांच्या आयुष्यात त्यांनी अनेक मित्र जोडले आणि अनेक विषयांमध्ये कसब प्राप्त केले. एखाद्या वाघासारखी शरीरयष्टी लाभलेल्या जोजन साहेबांचे मन मात्र खूप हळवे होते. पत्नी आणि दोन मुले, आई, वडील यांच्यावर त्यांचे जिवापाड प्रेम होते. सैनिकी जीवनातील अनिश्चितता त्यांना ठाऊक असल्याने प्रत्येक क्षण पुरेपूर आनंदाने जगण्याचा त्यांचा प्रयत्न असत. त्यांनी हेलिकॉप्टरचालक प्रशिक्षण घेतले आणि भारताच्या सीमांवर तैनात असलेल्या शीघ्र कृती दलाचा एक महत्त्वाचा घटक म्हणून सहा वर्षे प्रभावी कामगिरी करून नाव कमावले… त्यांच्या गणवेशावर आर्मी एविएशन कोअरचे पंख सन्मानाने मिरवत राहिले.

कर्नल जोजन साहेब त्या अतिरेक्याच्या अगदी समोर उभे होते… इतक्या जवळून रायफल झाडता येत नाही… थेट भिडायला लागते… जोजन साहेबांनी त्या अतिरेक्यावर झडप घातली… त्याला जणू मरणमिठीच मारली…. जोरदार संघर्ष झाला…. आणि शेवटी वाघाने तो पिसाळलेला कुत्रा मारला! पण साहेब पुन्हा उठून उभे राहू शकले नाहीत. आपल्या इतर सैनिकांनी तोवर इतर तीन जनावरे यमसदनी धाडून दिली होती… एकूण सहा शिकारी झाल्या होत्या! अतिरेक्यांना टिपताना नाईक नीरज आणि शिपाई सुलतान सिंग हे दोघे जखमी होऊन हुतात्मा झाले होते! या दोघांना मरणोत्तर सेना मेडल जाहीर झाले.

प्रत्येक मोहिमेत वैद्यकीय साहाय्य दल सोबत घेऊन जाता येतेच असे नाही… डोंगर, रस्ते, अंधार, अंतर या अडचणी असतात… त्यातून जखमींना अतित्वरीत वैद्यकीय मदत देता येतेच असे होत नाही, गरज पडली आणि शक्य झाल्यास हेलीकॉप्टरमधून जखमींना लष्करी रुग्णालयात नेले जाते. पण त्यादिवशी एवढे सर्व करूनही जोजन साहेबांचे प्राण वाचू शकले नाहीत! पण त्यांनी त्यांचे शब्द खरे करून दाखवले…. अतिरेक्यांना माझ्या सैनिकांपर्यंत पोहोचायचे झाल्यास… त्यांना माझ्या मृतदेहावरूनच पुढे जावे लागेल!

‘अशोक चक्र’ हा शांतता काळात सैनिकांना प्रदान केला जाणारा सर्वोच्च सैनिक सन्मान मानला जातो. त्याचे मानकरी ठरले कर्नल जोजन… मरणोत्तर अशोक चक्र विजेते! हुतात्मा कर्नल जोजन थॉमस यांच्या धीरोदात्त पत्नी बीना यांनी तत्कालीन महामहीम राष्ट्रपती महोदया श्रीमती प्रतिभाताई पाटील यांच्या हस्ते राजधानी दिल्लीमध्ये २००९ मधील प्रजासत्ताक दिनी हा पुरस्कार स्वीकारला! पती गमावल्यानंतर बीनाताई यांनी अगदी कमी कालावधीत स्वत:ला सावरले… कारण त्यांच्या पदरात दोन मुले होती… मुलगी मेघना आणि मुलगा फिलेमॉन. बीनाताई यांनी कर्नल जोजन साहेबांच्या स्मृति कायम राहाव्यात यासाठी विशेष उपक्रम हाती घेतले. साहेबांची जीवनकहाणी सांगणारी चित्र-पुस्तिका त्यांनी प्रसिद्ध केली. साहेबांचे स्मारक उभारले.

भारतास धुळीस मिळवण्याचे स्वप्न पाहणा-या शत्रूला प्रत्युत्तर म्हणून, जिथे कर्नल जोजन साहेब आणि अन्य सैनिकांनी देह ठेवले, त्या स्थळी भारतीय सेनेने नाझ-ए-हिंद अर्थात हिंदुस्थानाचा अभिमान नावाने एक मोठे स्मृतिस्थळ उभारले गेले आहे. इथे शंभर फूट उंचीच्या ध्वजस्तंभावर तिरंगा डौलाने फडकत असतो. इथे कर्नल साहेबांची शौर्यगाथा प्रकाशित केलेली आहे. इथल्या द-या-खो-यात केरळमधून काश्मिरात आलेल्या आणि देशाचे शत्रू असलेल्या अतिरेक्यांची शिकार केलेल्या वाघाची डरकाळी कायम घुमत असते… या वाघाचे नाव जोजन! हम रहे या न रहे… यह देश रहना चाहिये…. यासाठी असे अनेक वाघ आपले प्राण देत असतात! देशाने त्यांच्या प्रती कृतज्ञ रहायला हवे…. त्यांच्या कथा पुढच्या पिढीला सांगत राहायला हव्यात…. कारण पुढच्या पिढ्यांना त्यांचा वारसा घ्यावा लागणार आहे! जयहिंद!

कर्नल जोजन साहेबांची कहाणी तुम्हाला इतरांना सांगावी वाटली तर जरूर सांगा. जिन्हे नाझ है हिंद पर वह कहां है? .. या प्रश्नाचे उत्तर देणे गरजेचे आहे!

© श्री संभाजी बबन गायके 

पुणे

9881298260

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ ‘नामलिंगानुशासनम् – अमरकोश…’ ☆ श्री दिवाकर बुरसे ☆

श्री दिवाकर बुरसे

? इंद्रधनुष्य ?

☆ ‘नामलिंगानुशासनम् – अमरकोश…’ ☆ श्री दिवाकर बुरसे

अमरकोश” हा संस्कृत भाषेतील सर्वात प्राचीन आणि प्रसिद्ध नामकोश (शब्दकोश) आहे. याची रचना अमर सिंह या विद्वानांनी केली आहे. खाली अमरकोश आणि त्याचे रचनाकार, रचना, महत्व, अभ्यासपद्धती व त्यावर झालेल्या टीकांचा संक्षिप्त आढावा घेण्याचा प्रयत्न केला आहे.

१. रचनाकार – अमर सिंह

काल: अदमासे चौथ्या-पाचव्या शतकात (गुप्तकालात)

राजाश्रय: काही विद्वानांच्या मते अमर सिंह हे विक्रमादित्य (बहुधा चंद्रगुप्त विक्रमादित्य) यांच्या नवरत्नांपैकी एक होते.

व्यक्तिमत्व: संस्कृत भाषेतील शब्दविज्ञान, व्याकरण आणि काव्यशास्त्र यांचा गाढ अभ्यास असलेले पंडित. त्यांनी भाषेतील सर्व नामशब्द एकत्र करून त्यांची अर्थवर्गवारी केली.

२. अमरकोशाची रचना

अमरकोशाचे मूळ नाव आहे “नामलिंगानुशासनम्” (नाम आणि लिंग यांचे अनुशासन). त्यात तीन ‘निघंटु’ (भाग) आहेत, ज्यांना “काण्ड” असेही म्हणतात.

३. विभागणी

प्रथमकाण्डम् /स्वर्गादिकाण्डम्

यामध्ये आकारा वर्ग आहेत (स्वर्ग, देव, ब्रह्मांड इत्यादी विषय)

१ स्वर्गवर्गः २ व्योमवर्गः ३ दिग्वर्गः ४ कालवर्गः ५ धीवर्गः ६ वाग्वर्गः७ शब्दादिवर्गः ८ नाट्यवर्गः ९ पातालभोगवर्गः १० नरकवर्गः ११ वारिवर्गः

द्वितीयकाण्डम्/भूवर्गादिकाण्डम्

(पृथ्वी, देश, पर्वत, वनस्पती, प्राणी, मानव इ. विषय)

या कांडमध्ये दहा वर्ग आहेत:

१ भूमिवर्गः २ पुरवर्गः ३ शैलवर्गः ४ वनौषधिवर्गः ५ सिंहादिवर्गः ६ मनुष्यवर्गः७ ब्रह्मवर्गः ८ क्षत्रियवर्गः ९ वैश्यवर्गः १० शूद्रवर्गः

तृतीयकाण्डम्/सामान्यादिकाण्डम्

समानार्थक व विपर्ययार्थक शब्दकांड (गुण, दोष, मनोवृत्ती, काल, क्रिया इत्यादी)

या कांडामध्ये सहा वर्ग आहेत:

१ विशेष्यनिघ्नवर्गः २ संकीर्णवर्गः ३ नानार्थवर्गः४ नानार्थाव्यवर्गः ५ अव्ययवर्गः ६ लिंगादिसांगवर्गः

४. अमरकोशाचे महत्व

संस्कृतमधील सर्वात जुना आणि अधिकृत समानार्थी शब्दकोश. संस्कृत, प्राकृत, पाली, तसेच मराठी, हिंदी, गुजराती इ. भाषांमधील शब्दनिर्मिती, व्युत्पत्ती व समानार्थक शब्दांची परंपरा हाच कोश दर्शवतो. विद्यार्थ्यांना संस्कृत शब्दसंपदा वाढविण्यास आणि कविंना योग्य शब्द योजण्यास सहाय्य करणारा. नंतरच्या काळातील सर्व शब्दकोशांचा उदा. हेमकोश, विश्वकोश, राजतरंगिणीतील संदर्भ इ. आधारभूत ग्रंथ.

५. या कोशाचे वेगळेपण

अर्थवर्गांनुसार विभागणी केली आहे. उदा. देववर्ग, पाताळवर्ग, वनस्पतीवर्ग इ. समानार्थी शब्द एकत्र देऊन त्यांच्या लिंगनिर्देशासह -पुल्लिंग, स्त्रीलिंग, नपुंसकलिंग उल्लेख केला आहे. छंदबद्ध शैलीमुळे तो इतर गद्य कोशांपेक्षा काव्यात्मक व स्मरणीय आहे. ही मोठी वैशिष्ट्ये आहेत अमरकाशाची. अमरकोशात व्याकरण, व्युत्पत्ती, लिंगशास्त्र आणि शब्दशास्त्र यांचा सुंदर संगम दिसतो.

६. अमरकोश कसा पहायचा, अभ्यासायचा?

अमरकोश छंदबद्ध असल्यामुळे विद्यार्थ्यांनी तो कंठस्थ करून अभ्यासावा. प्रत्येक वर्गात येणाऱ्या शब्दांचा अर्थ, लिंग आणि उपयोग जाणून घेणे आवश्यक आहे. अमरकोशावरील टीका आणि भाष्यांसह त्याचा अभ्यास केल्यास अर्थ अधिक स्पष्ट होतो. उदा. “अमरकोशभाष्य”, “अमरटीका”, “रामाश्रयी टीका” इ. उपयुक्त आहेत. आधुनिक अभ्यासात “अमरकोशसंहिता”, “अमरकोशसोपान” अशी मराठी स्पष्टीकरणेही वापरली जातात.

७. प्रमुख टीकाग्रंथ

अमरकोशावर आज पर्यंत ४० पेक्षा अधिक टीकाकारांनी टीकाग्रंथ लिहिले आहेत. त्यातील काही प्रमुख टीका खालील प्रमाणे –

१. क्षीरस्वामीची टीका: सर्वात प्राचीन आणि प्रसिद्ध भाष्य.

२. ललितादित्य, रघुनाथ, भानुकीर्ति, भट्टोजी दीक्षित इत्यादी विद्वानांची भाष्ये.

३. मराठीतही काही टीका व अर्थसंग्रह झाले आहेत, उदा. “अमरकोशार्थदीपिका”, “अमरकोशसार” इ. महान अर्थशास्त्री आणि संस्कृत विद्वान स्व. चिंतामणराव देशमुखांना अमरकोश अत्यंत प्रिय होता. त्यांनीही अलिकडच्या काळात निवृत्तीनंतर, निधनापूर्वी काहीच वर्षे अमरकोशावर टीका लिहून प्रकाशित केल्याचे केवळ ऐकून आहे. प्रत्यक्ष वाचायला मात्र अजून उपलब्ध होऊ शकलेली नाही.

८. मराठीसाठी अमरकोशाचे महत्व

मराठीतील समानार्थी शब्द, लिंगभेद, आणि व्याकरण परंपरेवर अमरकोशाचा प्रभाव आहे. जुन्या मराठी कवींनी (ज्ञानेश्वर, नामदेव, तुकाराम, मोरोपंत, वामनपंडित इ.) जी संस्कृत शब्दसंपदा आपल्या रचनात उपयोजली तिचा पाया अमरकोश आहे. संस्कृत शिक्षणात अमरकोश अभ्यासक्रमाचा आवश्यक भाग म्हणून आजही आहे. पूर्वी विद्यार्थ्यांकडून तो मुखोद्गत करून घेतला जात असे

९. वागनीसाठी काही श्लोक*

 वानगीप्रीत्यर्थ प्रत्येक कांडातील दोन – दोन श्लोक त्यांच्या अर्थासह पुढे देत आहे –

१. स्वर्गादिकाण्डातील दोन श्लोक

(१) स्वर्गः त्रिदिवमाकाशं नभो व्योमान्तरीक्षदम् ।

द्यौर्द्यावा गगनं वियद् अन्तरिक्षं नभः नभः ॥

अर्थः 

‘स्वर्ग’, ‘त्रिदिव’, ‘आकाश’, ‘नभ’, ‘व्योम’, ‘अन्तरिक्ष’, ‘द्यौः’, ‘द्यावा’, ‘गगन’, ‘वियत्’ हे सर्व शब्द आकाश किंवा स्वर्ग या अर्थी वापरले जातात. म्हणजे या सर्वांचा अर्थ “आकाश / स्वर्ग” असा आहे.

(२) इन्द्रः शक्रः पुरन्दरः कोषिकः पाकशासनः।

मेघवाहनवज्री च देवराजो वज्रभृत् ॥

अर्थः 

‘इन्द्र’, ‘शक्र’, ‘पुरन्दर’, ‘कोषिक’, ‘पाकशासन’, ‘मेघवाहन’, ‘वज्री’, ‘देवराज’, ‘वज्रभृत्’ — हे सर्व शब्द देवांचा राजा ‘इंद्र’ याचे समानार्थक शब्द आहेत.

२. भूम्यादिकाण्डातील दोन श्लोक

(१) भूमिर्मेदा क्ष्मा वसुधा वसुन्धरा क्षोणिः क्षोणी वसुमती धरणी धरित्री ॥

अर्थः 

‘भूमी’, ‘मेदा’, ‘क्ष्मा’, ‘वसुधा’, ‘वसुन्धरा’, ‘क्षोणि’, ‘वसुमती’, ‘धरणी’, ‘धरित्री’ — हे सर्व पृथ्वीचे समानार्थक शब्द आहेत.

(२) नदी सरित् सरस्वती तोया आपोऽम्बु वारि सलिलम् ॥

अर्थः 

‘नदी’, ‘सरित्’, ‘सरस्वती’, ‘तोय’, ‘आपः’, ‘अम्बु’, ‘वारि’, ‘सलिल’ — हे सर्व शब्द ‘पाणी’ (जल) या अर्थाने वापरले जातात.

३. समान्यादिकाण्डातील दोन श्लोक

(१) वाचा गिरिर्वाग् गिरा गिरा गीः शब्दो ध्वनिः स्वरः ।

निःस्वनः स्फोट उच्छ्वासो नादो रावो रवः स्वनः ॥

अर्थः 

‘वाच्’, ‘गिरि’, ‘वाक्’, ‘गीः’, ‘शब्द’, ‘ध्वनि’, ‘स्वर’, ‘निःस्वन’, ‘स्फोट’, ‘उच्छ्वास’, ‘नाद’, ‘राव’, ‘रव’, ‘स्वन’ हे सर्व शब्द ‘ध्वनी’ (आवाज / शब्द) या अर्थाने वापरले जातात.

(२) ज्ञानं बुद्धिर्मतिर्धीः प्रज्ञा संवित्स्मृतिः स्मृति: ।

मेधा मनिश्च चेतश्च संज्ञा सञ्ज्ञेति चोच्यते ॥

अर्थः

‘ज्ञान’, ‘बुद्धि’, ‘मति’, ‘धी’, ‘प्रज्ञा’, ‘संवित्’, ‘स्मृति’, ‘मेधा’, ‘मनस्’, ‘चेतस्’, ‘संज्ञा’. हे सर्व शब्द ज्ञान, विचारशक्ती किंवा बुद्धी या अर्थाने वापरले जातात.

१०. सारांश

माहितीग्रंथाचे नाव ‘नामलिंगानुशासनम्’ अर्थात् ‘अमरकोश’ आहे. याचे रचनाकार : अमर सिंह. यांचा काल इ. स. चौथ्या–पाचव्या शतकातला. ग्रंथाची भागसंख्या: ३ – स्वर्गादिकांड, भूम्यादिकांड, सामान्यादिकांड. शब्दसंख्या अदमासे ३, ०००. शैली: छंदबद्ध. अनुष्टुभ्. महत्व: पहिला संस्कृत समानार्थी शब्दकोश. टीका: क्षीरस्वामी, ललितादित्य, भानुकीर्ति इ. मराठीभाषेवर गाढ प्रभाव, भाषिक परंपरेचा पाया, शब्दसंपदेचा आधार.

आपली भाषा संपन्न व्हावी, आपल्याकडे विस्तृत शब्दसंग्रह असावा, नवनवीन शब्द निर्माण करण्याची क्षमता असावी अशी इच्छा मनी बाळगणाऱ्या लेखक, कवीं, पत्रकारांनी अमरकोश अवश्य अभ्यासावा असे स्वानुभवाधारे आग्रहाचे सांगणे.

© श्री  दिवाकर बुरसे

पुणे

संपर्कः ९२८४३००१२५, ९५५२६२९२४५

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ वृक्षमाता सालूमरदा थिमक्का… ☆ श्री विश्वास विष्णु देशपांडे ☆

श्री विश्वास विष्णु देशपांडे

? इंद्रधनुष्य ?

☆ वृक्षमाता सालूमरदा थिमक्का… ☆ श्री विश्वास विष्णु देशपांडे 

काही दिवसांपूर्वी सालूमरदा थिमक्का गेल्याची बातमी आपण सगळ्यांनी वृत्तपत्रात वाचली असेल. सालूमरदा हे त्याचं नाव नाही. कानडी भाषेत त्याचा अर्थ होतो ‘ झाडांची रांग. ‘ रस्त्याच्या दुतर्फा अशी झाडांची रांग या स्त्रीने उभी केली म्हणून ती सालुमरदा.

संत तुकारामांच्या ‘वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे’ या उक्तीचा अर्थ हजारो वर्षांनी एका अशिक्षित आणि गरीब स्त्रीने त्यांच्या रूपाने आपल्या कृतीने सिद्ध केला. औपचारिक शिक्षण नाही, पण पर्यावरणाचे सखोल ज्ञान उपजतच होतं. अत्यंत गरीब कुटुंबात जन्मलेली आणि मोलमजुरी करणारी ही स्त्री. तिचा विवाह बिक्कल चिक्कय्या यांच्याशी झाला. पण दोघांनाही अनेक वर्ष मूल होऊ शकलं नाही. या गोष्टीला त्यांनी नियतीचा शाप न मानता, वृक्षांनाच अपत्य मानण्याचं ठरवलं. त्यांच्या पतीनेही त्यांना या कामात मनापासून साथ दिली.

त्यांच्या गावाजवळून ९४ क्रमांकाचा राष्ट्रीय महामार्ग जात होता. हुलीकल ते कुडूर या रस्त्यावर त्यांनी वडाची काही रोपे लावली. या रोपांना वाढवणे हा जणू त्यांच्या जीवनात कामचा एक भाग झाला. उन्हाळ्यात दूरवरून पाण्याचे हंडे घेऊन येणे, रोपांभोवती काटेरी कुंपण घालणे—हे त्यांचे रोजचे व्रत होते. ४० वर्षांहून अधिक काळ त्यांनी हा निस्वार्थ त्याग केला. त्यांच्या या ‘सालुमरदा’ (झाडांची रांग) मुळेच त्यांना हे आदराचे नाव मिळाले. या वाटेवर तब्बल ३८५ वडाची झाडे त्यांनी लावली. या झाडांवर पक्षी राहू लागले. वाटसरूंना आणि गुराढोरांना रस्त्यावर सावली मिळाली. एक नवीन विश्व उभे राहिले. एखाद्या व्यक्तीने ठरवले तर ती केवढे मोठे कार्य करू शकते हे त्यांच्या या कार्यातून सिद्ध होते.

असे सांगितले जाते की एकदा या रस्त्याने कर्नाटक मधील एक खासदार जात होते. दुपारच्या उन्हामुळे त्यांना अस्वस्थ वाटू लागले आणि त्यांनी रस्त्यावरील या वटवृक्षांच्या सावलीत थोडा वेळ विश्रांती घेतली. रस्त्याच्या दुतर्फा असलेली वटवृक्षांची रांग पाहून त्यांना खूप आनंद वाटला आणि हे एवढे मोठे काम कोणी केले असा प्रश्न त्यांना पडला. अधिक चौकशी केल्यानंतर त्यांना लोकांनी थिमक्का यांचे नाव सांगितले आणि अशा रीतीने त्यांचे कार्य प्रकाशात आले.

ज्या काळात पर्यावरण संरक्षणाचा फारसा गाजावाजा केला जात नव्हता अशा काळात त्यांनी ह कार्य केले. आज संपूर्ण जग जागतिक तापमानवाढीच्या (Global Warming) भीषण संकटाचा सामना करत आहे. कार्बन उत्सर्जन कमी करणे आणि निसर्गाचे संतुलन राखणे ही काळाची गरज बनली आहे. या पार्श्वभूमीवर, थिमक्का यांनी केलेले कार्य केवळ एक सामाजिक उपक्रम नाही, तर ते २१ व्या शतकातील पर्यावरण संरक्षणाचे प्रभावी मॉडेल आहे.

त्यांनी लावलेले प्रत्येक वडाचे झाड आज एक नैसर्गिक ‘कार्बन सिंक’ म्हणून कार्यरत आहे. ही वटवृक्ष पिढ्यानपिढ्या वातावरणातील कार्बन डायऑक्साइड (CO2) शोषून घेतात आणि त्या बदल्यात ऑक्सिजन बाहेर टाकतात. थिमक्का यांनी आपल्या निष्ठेच्या बळावर एक नैसर्गिक CO2 फिल्टर तयार केला. त्यांच्या कार्यामुळे भूजल संवर्धन झाले आणि मातीची धूप थांबली. त्यांचे कार्य म्हणजे जागतिक तापमानवाढीच्या विरोधात केलेली एक स्थलांतरित (Local) आणि अत्यंत प्रभावी कृती होती.

थिमक्का यांच्या कार्याला त्यांच्या मानसपुत्र उमेश यांचा मोठा आधार लाभला. उमेश यांनी केवळ थिमक्का यांची वृद्धापकाळात सेवा केली नाही, तर या वृक्षारोपण मोहिमेचे व्यवस्थापन केले. दूरवरून पाणी आणणे असो, की या कार्याची माहिती प्रशासनापर्यंत पोहोचवणे असो, उमेश हे थिमक्का यांच्या कार्याचे संवर्धक ठरले. त्यांच्या मदतीमुळेच थिमक्का यांच्या निस्वार्थ कार्याला पद्मश्रीसह अनेक राष्ट्रीय पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले.

२०१९ मध्ये त्यांना पद्मश्री पुरस्कार मिळाला त्यावेळी त्या १०७ वर्षांच्या होत्या. त्या स्वतः पुरस्कार स्वीकारण्यासाठी गेल्या. त्यावेळेस ते राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते त्यांनी तो स्वीकारला. हा पुरस्कार स्वीकारत असताना त्यांनी आपला हात आशीर्वादासारखा रामनाथ कोविंद यांच्या मस्तकाला लावला. त्यामुळे आपण भारावून गेलो अशा प्रकारचे भावपूर्ण उद्गार राष्ट्रपतींनी काढले.

सालुमरदा थिमक्का यांना वटवृक्षाप्रमाणेच ११४ वर्षांचे दीर्घायुष्य लाभले. त्यांनी शांतपणे जगाचा निरोप घेतला. पण त्यांचे कार्य आजही जिवंत आहे.

“वृक्ष लावणारे निघूनिया जाती, तळी विसावते सानथोर।”

या उक्तीप्रमाणे, थिमक्का आणि त्यांचे पती आज नसले, तरी त्यांनी लावलेले वटवृक्ष आजही दिमाखात उभे आहेत. त्यांच्या शीतल छायेखाली वाटसरूंना सावली मिळते, प्राणी-पक्षांना आश्रयस्थान लाभते आणि परिसर शुद्ध राहतो.

थिमक्का यांनी जगाला दाखवून दिले की, पर्यावरणाचे रक्षण करण्यासाठी कोट्यवधी रुपयांची गरज नाही; त्यासाठी मनापासून इच्छा आणि निसर्गाप्रतीचे वात्सल्य आवश्यक आहे. त्यांचे जीवन चिरंतन प्रेरणास्रोत राहील आणि ग्लोबल वॉर्मिंगच्या संकटावर मात करण्यासाठी त्यांची ‘वृक्षमाता’ म्हणून असलेली भूमिका जगाला नेहमी दिशा देत राहील.

©️ श्री विश्वास विष्णु देशपांडे

चाळीसगाव.

 प्रतिक्रियेसाठी ९४०३७४९९३२

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ एक ‘सच्चा‘ कलावंत!! ☆ प्रा. भरत खैरकर☆

प्रा. भरत खैरकर

? इंद्रधनुष्य ?

श्री सचिन कुटे

☆ एक ‘सच्चा‘ कलावंत!! ☆ प्रा. भरत खैरकर ☆

चित्रकला मनातील भावना रेषा व रंगांत उतरवते, तर ॲनिमेशन त्या भावनांना आवाज व हालचाली देऊन जगासमोर उभं करते. चित्रकला म्हणजे आत्म्याची भाषा, आणि ॲनिमेशन म्हणजे त्या भाषेचा चालता-बोलता अनुवाद असं बोलल्या जातं. आणि हाच चालता बोलता अनुभव घ्यायचा असेल तर लोणावळा येथे दीड दोन वर्षांपूर्वी सुरू झालेले ट्रिक विजन संग्रहालय एकदा तरी बघावे असे आहेच.

ट्रिक विजन संग्रहालय लोणावळा हे थ्रीडी आर्ट आणि आभासी प्रतिमा यांचा सुरेख संगम असलेलं संग्रहालय आहे. ह्या ठिकाणी असलेल्या ५० हून अधिक अद्वितीय थ्रीडी सेटअप मुळे येणाऱ्या अभ्यागतांना किंवा पाहुण्यांना खूप मजा येते. परस्परांशी संवाद आणि मनाला मोहून टाकणारे फोटो आणि व्हिडिओ शूट ह्या ठिकाणी पर्यटकांना आकर्षित करते. वैयक्तिक मार्गदर्शनासह.. संस्मरणीय छायाचित्रे काढण्यासाठी या ठिकाणी मदतनीस ठेवले असल्याने अजूनच मजा येते.

ह्या ठिकाणी डायनोसॉर पासून बचाव करत करत संपूर्ण कुटुंबासह बाहेर निघणे.. थ्रीडी इलेव्हशनचा वापर करून केलेल्या दऱ्याखोऱ्या पार करणे.. इजिप्त मधील पिरॅमिडला भेट देऊन तेथील मम्मीज सोबत फोटो काढणे.. खोल दरीमध्ये असलेल्या व्हर्टिकल पिलर वरून उड्या मारत पलीकडे जाणे.. आणि हे सर्व करत असताना किंचित एक्टिंग करणे म्हणजे केवळ मजा आणि मजाच आहे. डिज्नी वर्ल्ड किंवा समुद्र तळाची दुनिया ऑक्टोपस सह अनुभवणे.. जादूगाराच्या मदतीने काचेच्या बॉटलमध्ये स्वतःला बंद करून घेणे.. समुद्राच्या लाटेवर सरफिंग करणे.. ढगांमध्ये असलेल्या बर्फाच्छादित गावामध्ये सफर करणे.. समुद्राच्या तळाशी माशांसोबत केक कँडी आईस्क्रीम खाणे.. इत्यादी अद्भुत अनुभव तुम्ही या ठिकाणी घेऊ शकता.. आता तर या ठिकाणी आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर करून तुम्ही संपूर्ण संग्रहालयाचा सजीव असा अनुभव घेऊ शकता.. आणि ह्या सगळ्या गोष्टी करणारा.. करवून घेणारा जो कलावंत ह्या पाठीशी आहे.. तो आहे चित्रकार, वॉल आर्टिस्ट, ॲनिमेटर, एक शिक्षक सचिन कुटे!!

सचिन कुटे निगडी येथील सिटी प्राईड स्कूल ह्या नामवंत शाळेमध्ये मागील दहा वर्षापासून ॲनिमेशन डिपार्टमेंट सांभाळतात.. तत्पूर्वी ते हैदराबाद येथील फिल्म स्टुडिओमध्ये आर्टिस्ट म्हणून कार्यरत होते.. लोणावळा सौंदर्यीकरणामध्ये त्यांचा महत्त्वाचा वाटा आहे.. त्यांनी रोटरी क्लब लोणावळा च्या माध्यमातून अनेक ठिकाणी जसे की लायन्स पॉईंट, भुशी डॅम, पोलीस ट्रेनिंग सेंटर या ठिकाणी सौंदर्य करण्यासाठी मदत केलेली आहे. त्यांनी तुंगार्ली तलावाला स्वच्छ करण्यासाठी व परिसरामध्ये वृक्षारोपणासाठी आपला मित्रपरिवार व विद्यार्थ्यांची मदत घेऊन कार्य केले आहे. सचिनने आपल्या अनेक हॉटेल व्यवसायिक मित्रांना त्यांचे हॉटेल इंटेरियर डेकोरेशन करण्यासाठी.. हॉटेलला आर्टिस्टिक लूक देण्यासाठी मदत केलेली आहे.. लोणावळ्यातील अनेक राजकीय फ्लेक्स सचिनच्या चित्रकारितेतून साकारलेले आपणास पाहायला मिळतील.. चौका चौकातील झालेलं सौंदर्यीकरण किंवा कचऱ्यातून.. लोखंडी भंगारातून तयार झालेले ‘वेस्ट टू बेस्ट ‘विविध देखावे किंवा शिल्प त्यामागे सचिनचा मोठा वाटा आहे.

तसे पाहिले तर सचिनला कुटुंबामध्ये कोणतेही कलावंताचे बॅकग्राऊंड नाही.. फक्त जिद्द आणि आवड ह्या दोनच गोष्टींच्या बळावर ह्या पठ्ठ्याने साध्या पेन्सिलने सुरू केलेला हा प्रवास आता ए आय ॲनिमेटरपर्यंत पोहोचविला आहे.. तो एवढ्यावरच थांबला नाही तर थ्रीडी म्युझियम उभारून सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला आहे.. ह्यामागे त्याची अपार मेहनत कष्ट आणि जिद्द.. तसेच कुटुंबातील पत्नी अर्पिता हिचा व मुलगी गार्गी ह्या दोघींचा महत्वाचा वाटा आहे. येणाऱ्या काळामध्ये सचिनच्या हातून अद्भुत अशा गोष्टी डिझाईन थिंकिंग.. प्रोडक्ट डेव्हलपमेंट.. यांच्या माध्यमातून येणार आहे हे आम्हाला चांगले माहिती आहे!! म्हणूनच आमच्या ‘सच्च्या‘ला सचिनला त्याच्या पुढील प्रवासास हार्दिक हार्दिक शुभेच्छा!!

© प्रा. भरत खैरकर

संपर्क – बी १/७, काकडे पार्क, तानाजी नगर, चिंचवड, पुणे ३३. मो.  ९८८१६१५३२९

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆”तेव्हा आणि आता…” –  लेखिका : सुधा मूर्ती ☆ सुश्री प्रभा हर्षे ☆

सुश्री प्रभा हर्षे

? इंद्रधनुष्य ?

☆ “तेव्हा आणि आता” –  लेखिका : सुधा मूर्ती ☆ सुश्री प्रभा हर्षे

तेव्हा आणि आता – – 

(१) १९७९ चा एप्रिल महिना

मी त्यावेळेस अमेरिकेला पहिल्यांदाच गेले होते.

मला बोस्टनला जायचं होतं. तेव्हा एकूणच भारतातून लोकांचं परदेशी जाण्याचे प्रमाण फार कमी होतं. 

माझा नंबर येताच इमिग्रेशन ऑफिसरने माझ्यावर प्रश्नांची सरबत्ती सुरू केली.

” मॅडम, तुम्ही अमेरिकेत कशासाठी आलेला आहात? “

” माझे पती येथे डेटा कंपनीत नोकरीस आहेत, त्यांना भेटायला आले आहे.”

” तुम्ही किती महिने राहणार आहात? “

” जास्तीत – जास्त ६ महिने.”

” तुम्ही भारतात नोकरी करता का?  करत असलात तर तसे प्रमाणपत्र व सॅलरी स्लिप दाखवा.” 

मी ती कागदपत्रे दाखवली.

” तुम्ही बोस्टन मध्ये किती दिवस राहणार आहात? “

” मी थोडे दिवस येथे राहीन व नंतर माझ्या भावाकडे बर्कलेला जाईन.”

” मला तुमचं परतीचं तिकीट दाखवा आणि तुम्ही येताना किती पैसे आणले आहेत ते सांगा.”

” माझ्याकडे ५०० डॉलर्स आहेत, असं म्हणून मी परतीचे तिकीट दाखवले.

त्यानं माझ्याकडे अविश्वासाने पाहिले आणि माझ्या पासपोर्टच्या व्हिसाच्या पानावर ३ महिन्यांचा शिक्का मारून तो मला परत दिला.

मग माझ्याकडे पाहून तो म्हणाला,

” तुम्ही अंगात काय प्रकारचा पेहराव घातला आहे? “

” मी भारतीय परंपरेनुसार साडी नेसलेली आहे. हा आमचा राष्ट्रीय पोशाख आहे.”

” हं, तुम्ही भारतातून आला आहात तर!

कुठे आहे हा देश?  

जपानच्या जवळ आहे का आफ्रिकेत आहे? “

” नाही, आशिया खंडात आहे.”

” मग तुम्हाला इंग्रजी कसं काय येतं.”

” भारतात खूप वेगवेगळ्या भाषा बोलल्या जातात.

शाळेत आम्ही इतर भाषांबरोबर इंग्रजीसुद्धा शिकतो.”

त्या ऑफिसरची शिफ्ट आता संपत आली होती.

तेवढ्यात दुसरा ऑफिसर कामावर हजर झाला.

तो म्हणाला,

“तुम्ही कपाळाला काय लावलं आहे?”

“त्याला आमच्याकडे बिंदी किंवा कुंकुम म्हणतात. अनेक भारतीय स्त्रिया ते लावतात.”

” हो, एका डॉक्युमेंटरी मध्ये मी भारता बद्दल बरीच माहिती पहिली होती. मी असं ऐकलंय की तुमच्या देशात विधवांना जाळून टाकतात म्हणे. तुमच्याकडे २ वर्ग असतात, एक महाराजा व एक भिकारी. तुम्ही लोकं साप पाळता व तुमच्याकडे हायवे वरून गाई फिरतात, हे सगळे खरे आहे का? “

त्याचं ते उर्मटपणाचे बोलणं ऐकून मला धक्काच बसला.

” या सर्व प्रथा फार पूर्वीच बंद झाल्या आहेत.आमच्याकडे गाई हायवे वरून फिरत नाहीत.”

” तुमच्या मालकीचा हत्ती आहे का? “

” हत्ती पाळणे काही तेवढे सोपे नाही, पण मी अनेक हत्ती पाहिले आहेत” मी हसून म्हणाले.

” ठीक आहे, ठीक आहे, तुम्ही जाऊ शकता.”

मग कस्टम काउंटर पाशी गेल्यावर मी घेऊन गेलेल्या मसाल्यांची, जणू काही रोगराई पसरवणारे भयंकर जीवजंतू घेऊन आलेली स्त्री, अशी काटेकोर तपासणी केली गेली.

त्या सगळ्यातून बाहेर पडून बाहेर आल्यावर मला खूप निराश, उदास व थकल्यासारखे वाटू लागले होते.

(२) साल २००९ महिना बहुदा जुलै.

मी दक्षिण अमेरिकेतील कोलंबियाची राजधानी असलेल्या बोगोटा येथे काही भाषण देण्यासाठी गेले होते.

माझा नंबर आला.

व्हिसा ऑफिसर एक तरुण बोलका आफ्रिकन-अमेरिकन होता.

मी रांगेत शेवटचीच असल्याने तो निवांत टेकून बसला व प्रश्न विचारू लागला. 

आता तो नेहमीचेच रटाळ, कंटाळवाणे प्रश्न विचारणार, अशी मी मनाची तयारी केली होती, पण या वेळेस तसे काही घडले नाही.”

” ओह! बाई तुम्ही भारतातून आलात का?”

मी म्हणाले, ” हो मी भारतातून आले आहे.”

“तुम्ही अंगात घातलाय, तो तुमचा राष्ट्रीय पोशाख-साडी आहे ना?  खूप छान आहे आणि तुम्ही ती छान पद्धतीने नेसलेली आहे.”

मग मी हसून ‘ थँक्स ‘ एवढेच म्हटलं.

” तुम्ही भारतातून कुठून आलात? “

मी जरा चाचरत सांगितले की भारतात दक्षिण भागात बंगळुरू नावाचं एक शहर आहे-तेथून.”

” येस येस, बंगळुरू माहीत आहे की. ते तर सॉफ्टवेअरचे हब आहे. तेथून खूप लोकं मायामीला सुट्टी घालवायला येतात.

बरं बाई, आमच्या देशात तुमचा किती दिवस राहण्याचा बेत आहे?

मी भाषणा साठीचं गेले असल्याने म्हणाले,

” ३ दिवस.”

” का बरं तीनच दिवस का? “

“मला स्टॅनफर्ड युनिव्हर्सिटीत थोडं काम आहे, नंतर मी माघारी जाणार.”

” नाही, नाही तसं करू नका. तुम्हाला माहीत आहे का?

आमच्या देशात उत्कृष्ट दर्जाच्या युनिव्हर्सिटीज आहेत.अत्यन्त सुंदर राज्ये आहेत. ३ दिवसात तुम्ही आमचा देश कसा काय बघणार?  “

मग त्याने माझ्या पासपोर्ट वर ६ महिने वास्तव्यास परवानगी देणारा शिक्का मारला आणि म्हणाला,

” अहो, तुम्हाला एक प्रश्न विचारू का?  एनी वे, तुमच्याकडे आता वास्तव्याची परवानगी आहेच.”

” तुम्ही भारतीय लोकं एवढी चांगली कशी काय?

 भारतीय माणसं अगदी सरळ असतात.

 काही छक्के-पंजे नाहीत.

तुमचं नाव दहशतवाद्यांच्या यादीत कधीच नसतं. तुमच्यापैकी बरेच लोक प्रोफेशनल असतात.”

मी अभिमानाने स्मितहास्य करीत म्हणाले,

” आमच्यावर संस्कारच तसे असतात.”

आता प्रश्न विचारण्याची पाळी माझ्यावर होती.

” तुम्हाला भारताविषयी एवढं कसं काय माहीत? “

तो म्हणाला, ” ओह, ते काही कठीण नाही.मायामी मध्ये भरपूर भारतीय रेस्टॉरंट्स आहेत. विकेंडला मी तेथे जेवायला जातो ना! “

” मग तुम्हाला तिथे काय आवडतं?”

” मला भारतीय जेवण खूप आवडतं. तंदुरी चिकन, चिकन टिक्का, कबाब आणि बिर्याणी! “

असं म्हणून काम संपवून तो उठला.

मी बॅग घेऊन कस्टमकडे निघाले.

तो माझ्या बरोबरच चालू लागला.

म्हणाला,

” मला तुमच्या बॉलीवूड ची गाणी खूप आवडतात. मायामी मध्ये बॉलिवूड डान्स शिकवणारे क्लासेस सुद्धा आहेत. मला काजोल खूप आवडते. ती खूप टॅलेंटेड 

आहे! “

एव्हाना आम्ही कस्टमशी पोहोचलो होतो.

निरोप घेताना, तो म्हणाला,

” तुमच्याशी बोलून बरं वाटलं.तुमचा मुक्काम सुखदायी होवो.”

एवढं बोलून जाताना अमेरिकन स्टाईल ने गाणं गुणगुणत होता,

“सुरज हुआ मद्धम

चांद ढलने लगा

कभी खुशी कभी गम! “

मी पुढे गेले, तर कस्टम ऑफिसरने मला अडवले नाही.

फक्त जाण्याची खूण अदबीने केली!

मी हातात पासपोर्ट धरून विमानतळा बाहेर आले.

गेल्या ३० वर्षांत एवढे काय बरं बदललं.

असा मी विचार केला.

केवळ सॉफ्ट-वेअर च्या क्रांतीने हा बदल घडून आलेला नाही.

खरं तर पाश्चात्यांच्या नजरेतील भारताची प्रतिमा बदललेली आहे.

हे फार महत्त्वाचे आहे.

आता भारत एक नागा-सापांचा,

गारुड्यांचा व हत्तींचा देश राहिलेला नाही. भारतातून जाऊन इतर देशांत स्थायिक झालेले भारतीय लोक, भारतात राहून संपत्तीची निर्मिती करणारे बुद्धिमान धनिक लोक, आपली पुढची पिढी – जिने परदेशात जाऊन, काबाडकष्ट करून नाव कमावलेले आहे- साऱ्या विश्वाची नागरिक बनलेली आपली मुले, या सर्वांचा एकत्रित परिणाम म्हणून मायामीच्या विमानतळा पाशी सुद्धा मला ही भारताची नवी प्रतिमा पाझरलेली दिसली.

मी मनाशीच हसले व हातातील भारतीय पासपोर्ट कडे अभिमानाने पाहू लागले!

लेखिका : सुश्री सुधा मूर्ती 

(“आयुष्याचे धडे गिरवताना” या लीना सोहोनी यांनी अनुवाद केलेल्या व मेहता पब्लिशिंग हाऊस, पुणे यांनी प्रकाशित केलेल्या त्यांच्या पुस्तकातील एक आठवण)

प्रस्तुती : सुश्री प्रभा हर्षे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ लुप्त होणाऱ्या संस्कृतीच्या पाऊलखुणा — महिलांच्या आवडीची “झुरणीबाई” ☆ डॉ. धनंजय देशपांडे ☆

डॉ. धनंजय देशपांडे

? इंद्रधनुष्य ?

☆ लुप्त होणाऱ्या संस्कृतीच्या पाऊलखुणा — महिलांच्या आवडीची “झुरणीबाई” ☆ डॉ. धनंजय देशपांडे 

लुप्त होणाऱ्या संस्कृतीच्या पाऊलखुणा – – 

– – महिलांच्या आवडीची “झुरणीबाई”

चाळीस पन्नास वर्षांपूर्वीपर्यंत आपल्या संस्कृतीत खूपच चांगल्या काही गोष्टी होत्या. यामध्ये ज्ञान, विज्ञान आणि मानसिक आनंद असा संगम असायचा. ज्या आता लुप्त होत आहेत. त्याचा घेतलेला हा मागोवा… क्रमशः स्वरूपातील ही सिरीज! आधीच्या पोस्ट फेसबुक वॉलवर “लुप्त होणाऱ्या पाऊलखुणा” या फोल्डरमध्ये आहेतच.

आज अशा एका व्यवसाय व तो करणाऱ्या बाईंबद्दल सांगणार आहे ज्या आजच्या पिढीला माहीतही नसतील. त्यासाठीच ही आजची सहावी पोस्ट!!

तर पूर्वी (विशेषतः तालुका आणि गावपातळीवर) गल्लोगल्ली एका बाईचा आवाज घुमायचा. तो इतक्या वर्षांनंतरही माझ्या स्मरणात आहे कारण एक प्रकारचा हेल काढून एका लयीमध्ये ती बाई मध्य आणि तार सप्तकात तिच्याकडे असलेल्या वस्तुंची जणू जाहिरात करायची. साधारण लमाणी, कोंगाडी किंवा दक्षिणी पद्धतीचा तो आवाज होता. ती हातातली काठी रस्त्यावर आपटत (आवाज करत) त्या ठेक्यात ती म्हणायची 

घे ग बाई sssssss

बिब्ब घे, सुया घे, पोत घे, दाभण घे

कायच नसलं तर…

केसाचा गुंता दे… नाकातली मोरनी घे

*

आणि मग तिथं सावलीचा एखादा कोपरा पाहून बसून जायची. डोक्यावर एक गाठोडं असायचं. ते ती उतरवून खाली ठेवून त्याची गाठ सोडून आतलं सगळं पसरून तिचे ते जणू चालते फिरते दुकान मांडायची. तसेच एका हातात काठी व त्यावर आडव्या दोन तीन छोट्या काठ्या बांधून त्यावर महिलांना लागणाऱ्या बांगड्या, नाकातले, कानातले, कंगवे असं विविध वस्तू भांडारच जणू असायच तेही ती जवळच्या एखाद्या झाडाला टेकवून उभं करायची.

आणि मग आजूबाजूच्या घरातील महिलांची तिथं गर्दी उसळायची.

अथवा अजून एक प्रकार यात होता तो म्हणजे तिने “हाळी’ दिली की घरंदाज घरातल्या महिला तिला हाक मारून थेट घराच्या अंगणात बोलवून घ्यायच्या आणि त्या घरातील महिलांची मग ती एकप्रकारे खाजगी शॉपिंग व्हायची.

आता मुळात ती जी बाई… तिला “झुरणी बाई” म्हणतात (आमच्या मराठवाड्यात तरी) इतर ठिकाणी कदाचित वेगळं नाव असेल.

तर ती जे काही ठेक्यात गायल्या सारखं म्हणायची त्यातले अनेक शब्दही आता अनेकांना कळणार नाहीत तर ते आधी सांगतो.

बिब्ब घे, सुया घे, पोत घे, दाभण घे

यातला बिब्ब म्हणजे औषधी बिब्बा नावाचे कडक वाळलेलं फळ, कुणाला काटा टोचला तर बिब्बा गरम करून त्याचा चटका काट्याच्या जागी दिला की काटा बाहेर निघून यायचा. असे अनेक उपयोग बिब्ब्यात होते. आजीबाईच्या बटव्यात बिब्बा हमखास असायचा.

आणि सुया म्हणजे शिवणकामासाठी लागणाऱ्या विविध साईजच्या सुया…

पोत म्हणजे… मुलींसाठी अथवा मोठ्या स्त्रियांसाठी गळ्यात घालायचे एकप्रकारचे नेकलेस… त्यात रंगीत मणी असतील तो नेकलेस आणि काळे मणी असतील तर ते मंगळसूत्र…!

आणि दाभण म्हणजे सुईचा मोठा (आणि दणकट) भाऊ म्हणता येईल, याच दाभणाच्या मदतीने धान्याचे पोते शिवले जायचे.

अशा विविध वस्तू झुरणी बाईकडे असायच्या ज्या दैनंदिन जीवनात स्त्रियांना लागायच्या.

अर्थात या वस्तू विक्रीमध्ये नेहमी पैसेच दिले जातील असेही नसायचे. तर कधी धान्य रूपातही मोबदला दिला जायचा. आणि विशेष म्हणजे मनासारखी खरेदी झाली तर घरमालकीण मग त्या झुरणी बाईला हक्काने थांबवून जेवायला घालूनच पाठवणी करायची.

आता खरी गंमत पुढं आहे. ती झुरणी बाई ओरडताना म्हणायची…

केसाचा गुंता दे… नाकातली मोरनी घे

म्हणजे काय? तेच तर या झुरणी बाईच्या लुप्त होत जाणाऱ्या प्रथेचे मुख्य आकर्षण आहे.

त्याकाळी घरोघरी स्त्रिया केस विंचरून झाल्यावर कंगव्यात अडकलेले (गळणारे) केस एकत्र बोळा केल्यासारखं करून घराबाहेरच्या एखाद्या खुंटीला अडकवलेल्या पिशवीत साठवून ठेवले जायचे. असं महिना दीड महिना केलं की ती पिशवी भरायची आणि त्या काळात मग जर झुरणी बाई गावात आली तर तिला ती केसांची पिशवी देऊन त्याच्या बदल्यात तिच्याकडे असलेल्यापैकी आवडीची वस्तू घेतली जात असे. म्हणजे पैशाऐवजी चक्क केस दिले जायचे. त्यावेळी झुरणी बाई पण हुशार असायची. तो गुंता लांबसडक केसांचा असेल तर थोड्या जास्त किमतीची वस्तू ती मालकिणीला द्यायची. आणि आखूड / बारीक केसाचे पुंजके (गुंता) असेल तर कमी किमतीची वस्तू!

असं का? तर आताचे माहित नाही पण त्याकाळात ज्या स्त्रियांचे केस थोडे आखूड असत मात्र त्यांना लांब वेणी किंवा छान अंबाडा बांधून त्यावर गजरा माळायचा असायचा त्या स्त्रिया मग गंगावण विकत घ्यायच्या. गंगावण म्हणजे थोडक्यात सप्लिमेण्ट्री तुम्हाला मिळालेले केस. आता हे गंगावण बनवणाऱ्या कारागिराकडे या झुरणी बाई घरोघरी गोळा केलेला तो केसाचा गुंता (पुंजका) देऊन त्या बदल्यात त्याच्याकडून पैसे घ्यायची. आणि त्या केसाना स्वच्छ शिकेकाई रिठा वापरून धुवून वाळवून मग तो कारागीर त्यापासून नवीन गंगावण बनवून ते बाजारात विकायचा.

आहे न गंमत!

विंचरलेले केस गोळा करून कोपऱ्यात कुठं टाकले तरी नंतर त्यातले काही पुन्हा घरात येऊन स्वयंपाकात पडू शकतात. हे ओळखून पूर्वजांनी किती छान हि प्रथा सुरु केलेली की एका पिशवीत ते गोळा करायचे अन ते विकून तुम्हाला एखादी पोत (गळ्यातलं) घेता येईल. त्या आकर्षणातून मग स्त्रियाही केस गोळा करण्याच्या कंटाळा न करता निगुतीने जपून ठेवायच्या!

या झुरणी बाईची अजून एक खासियत होती. ती म्हणजे, लहान मुलींचे नाक अथवा कान टोचण्यासाठी सगळ्यांनाच सोनाराकडे जाणे परवडत नसे मग अशा घरच्या मुलीचे कान नाक टोचण्याचे काम हि झुरणी बाई करायची.

त्यासाठीच तिची ती ओळ असायची 

केसाचा गुंता दे… नाकातली मोरनी घे

म्हणजे तुझ्या केसाचे पुंजके दे मग मी नाक पण टोचून देईन आणि त्या नाकात घालायला मोरनी (म्हणजे आजच्या भाषेत “नोजरी”) देईल असं ती म्हणायची. नाक कान टोचून झाल्यावर त्यावर कोमट खोबरेल तेलात थोडी हळद मिसळून छिद्राच्या जागी लावली जायची. जेणेकरून जखमेत सेप्टिक होऊ नये. म्हणजे हौस मौजेच्या नाक कान टोचणीत सुद्धा झुरणी बाईकडे आयुर्वेदाचे ज्ञान होते. हे किती भारी न!

तर अशी हि झुरणी बाईची कथा!

याबद्दल ग्रामीण भागाची खडानखडा माहिती असलेल्या माझ्या मामींना विचारलं की “अजूनही तिकडे अशा झुरणी बाई येतात का गल्लीत? ” 

तर म्हणाल्या की, तालुक्यासारख्या शहरात आता दिसत नाहीत मात्र खेड्यात अधून मधून दिसतात. पण ते प्रमाण कमी झालं आहे आता. “

असो… कालाय तस्मेय नमः!! तर अशी हि झुरणीबाई आणि तिच्या कलेची लुप्त होत जाणारी प्रथा!

डॉ. डीडी क्लास : कोणतीच गोष्ट टाकाऊ नसते… अगदी गळून जाणारे केस पण कामाला येतात… हि खरी आपली संस्कृती ज्यातून झुरणीबाई आणि गंगावण हि संकल्पना आली असावी. दारावर आलेल्या झुरणीबाईला जेवायला घालण्याचे, आणि तिला तितका वेळ नसेल तर भाकरी भाजी फडक्यात बांधून तिला देण्याचे औंदार्य त्याकाळात होते. “पैसे दिले बात खतम” असं आजच्या सारखं तेव्हा नव्हतं. विक्रेता आणि ग्राहक यांच्यात फक्त आर्थिक नाते नसायचे तर माणुसकीचेही असायचे. हे या झुरणीबाईच्या प्रथेतून सांगण्याचा माझा प्रयत्न!

दादा कोंडकेंच्या सोंगाड्या सिनेमातील एक प्रसिद्ध मराठी गाणे आठवलं… ते यावरच होते…

मी येनार बी न्हाई

*

एक सांगायच राहिलेच! तर हे जे गंगावण होते तेही आता लुप्त झालेय. याचे कारण म्हणजे त्याकाळी आखूड (लहान) केस असणे स्त्रीला न्यूनगंड असायचा. लांब केस हेच सौंदर्याचे परिमाण मानले गेलेले… त्यामुळे घरोघरी गंगावण असायचेच. मात्र आताच्या काळात बदललेली परिस्थिती, कामाच्या ठिकाणी जाताना करावा लागणारा प्रवास आणि त्यात लांब केसांची होणारी फरफट, वेळेअभावी इच्छा असूनही “लांब” केसांची निगा राखता न येणे… अशा विविध कारणांमुळे “लांब केस” हेच आऊटडेटेड झाले त्यामुळे गंगावणाची गरजच उरली नाही आणि तेही बिचारे काळाच्या ओघात लुप्त झाले! असो 

तर जशी हि झुरणीबाई तशीच अजून एक होती… बोहारीण बाई… तिला भेटूया पुढच्या भागात अशाच एका वेगळ्या पण लुप्त होत जाणाऱ्या पाऊलखुणांबद्दल!

तोवर स्टे ट्यून!

© डॉ. धनंजय देशपांडे (dd)

(सायबर सिक्युरिटी तज्ञ, चित्रकार, लेखक, समुपदेशक, निवेदक)

मो न. ९४२२३०४३४४ 

1) Global Cyber Crime Helpline National Award winner

2) Digital Hero of the year National Award winner

3) HOD: Cyber Awareness Foundation, Maharashtra State

4) Mentor: Pune University (SPPU), CANADA and UK

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ मराठी ‘ झेंडे ‘ असे खाली का ओढले जातात? ☆ श्री संभाजी बबन गायके ☆

श्री संभाजी बबन गायके

? इंद्रधनुष्य ?

☆ मराठी ‘ झेंडे ‘ असे खाली का ओढले जातात? ☆ श्री संभाजी बबन गायके

भारतीय चित्रपटसृष्टी आणि त्यातल्या त्यात हिंदी चित्रपटसृष्टीने पोलिसांची प्रतिमा अतिशय मलीन करून ठेवलेली आहे. मराठीत दादा कोंडके यांनी पोलिसांना पांडू हे नाव दिले आणि पुढे लोकांनी या पांडूचा मामाही करून ठेवला. हिंदीत काम करणा-या मराठी कलाकारांच्या भूमिका काय असतात हे सर्वच जाणतात… अहो, एक सौंदर्यवती मराठी अभिनेत्री काही वर्षे परदेशी राहून पुन्हा भारतात परतली… तर तिला पुन्हा सुरुवात म्हणून एका साबणाच्या की फरशी पुसण्याच्या रसायनाच्या जाहिरातीत चक्क कामवाल्या बाईची भूमिका करावी लागली..!

पोलिसांची लाचखोरी आणि इतर गैरवर्तन हा गंभीर मुद्दा असला तरी अनेक शूर, कर्तव्यदक्ष आणि अतिशय दर्जेदार कामगिरी करून दाखवलेल्या पोलिसांची, अधिकाऱ्यांची संख्या कमी आहे का? मुंबईवर झालेल्या अतिरेक्यांच्या हल्ल्यात काय चित्रपटातले कलाकार आले होते काय? कसाबला जिवंत पकडण्यासाठी मुंबई पोलिसांनीच तळहातावर शीर घेतले होते! मानवत बाल हत्याकांड असो किंवा इतर शेकडो गुन्हे असोत, इंग्लंडच्या स्कॉटलंड यार्ड पोलिसांशी तुलना केले जाणारे आपले मराठी पोलिस दल आहे. असो.

भारताचे तत्कालीन पंतप्रधान राजीव गांधी यांचा मुंबई दौरा सुरु होता.. मुंबई पोलिस अर्थातच बंदोबस्तासाठी रस्त्यावर उभे होते. पंतप्रधानांनी अचानक त्यांची गाडी थांबवायला सांगितले… आणि त्यांनी एका पोलिस अधिकारी साहेबांना जवळ बोलाववून घेतले आणि त्यांच्याशी हस्तांदोलन केलं… पंतप्रधान एका (प्रोटोकॉलनुसार) पदाच्या बाबतीत कनिष्ठ पदावर असलेल्या पोलिस अधिका-याशी एवढी सलगी कशी दाखवतील?

मुंबईच्या अधोजगतात त्यावेळी खूप दरारा असलेल्या एका व्यक्तीला अटक केल्यानंतर एका मोठ्या राजकारणी व्यक्तीचा याच पोलिस अधिकारी साहेबांना अगदी प्रेमळ फोन आला होता…. साहेबांनी फोन करणाऱ्या महान व्यक्तीस अत्यंत विनयाने सांगितले होते.. साहेब, माझ्यासारख्या अतिसामान्य माणसाशी तुम्ही बोलणं काही बरं दिसत नाही… तुम्ही आमच्या आयुक्त साहेबांशीच बोलावं हे तुमच्या योग्यतेला धरून होईल!

सामाजिक नियम, कायदे यांच्याविषयी कमालीची असंवेदनशीलता दर्शवणा-या काही लोकांना याच वर्दीधारी साहेबांनी रस्त्यावर सामान्य लोकांसमोर पद संचलन करीत नेलं होतं.. सामान्य लोक याला धिंड काढणं असं म्हणतात बहुधा!

पण एवढं सगळं करूनही ‘हा तर माझ्या कामाचाच एक भाग आहे’ म्हणून नामानिराळे राहू शकणारे हे साहेब… जणू क्रिकेटच्या सामन्यात प्रतिस्पर्धी संघातील सर्वांत स्फोटक फलंदाजाचा अफलातून सूर मारून झेल घेणारा अष्टपैलू खेळाडू….. पुन्हा शांतपणे डीप फाईनलेगला उभा राहतो…. तसे! म्हणूनच पोलिस दलात प्रत्यक्ष लोकांत, समाजात जाऊन काम करण्याला फील्डवर असणे, अशी कंमेट केली जात असाव!

यांची कहाणी काही फार विशेष म्हणावी अशी नाही…. काही नाही सुमारे वीस खून केलेल्या, (यातील ब-याच महिला होत्या) कित्येक वेळा तुरुंगातून निसटून गेलेल्या (यात दिल्ली पोलिसांच्या तावडीतून तिहार तुरुंगातून याचं निसटून जाणं ही तर दिल्ली पोलिसांच्या तोंडावरचा कधीही पुसला जाणार नाही असा डाग म्हणावा लागेल) एका कुख्यात आंतरराष्ट्रीय गुन्हेगाराला या साहेबांनी एकदा नव्हे… दोनदा अटक केली होती! मुंबई पोलिस दलातील यांची सेवा फक्त सदतीस वर्षांची…. ए. सी. पी. म्हणून सेवानिवृत्त झाले. मुंबई पोलिस दलातील सर्वजण त्यांना मानतात. जातीय दंगलीदरम्यान लोकांच्यात थेट जाऊन लोकांना शांत, नियंत्रित करू शकणारे, हाती येतील त्या साधनाने मोठी आग विझवण्याची कामगिरी करून दाखवणारे, शांत आणि संयमी राहून गुन्हेगारांच्या आतल्या गोटातल्या बातम्या मिळवण्यासाठी अगदी जमिनीवर राहून (ग्राउंड लेवल, फील्ड वर्क) 

मा. राष्ट्रपती महोदयांच्या हस्ते सलग दोन वर्षे उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल त्यांचा सन्मान झाला आहे… आणि ते असे दोनदा सन्मानित होणारे एकमेव पोलिस अधिकारी ठरले होते!

सबंध भारतातील सर्व पोलिस, गुप्तहेर यंत्रणा ज्याचा जीव खाऊन शोध घेत होत्या त्या चार्ल्स शोभराज नावाच्या गुन्हेगाराला गोव्यातून या साहेबांनी अगदी नाट्यमयरीत्या पकडले होते… त्याप्रसंगात त्यांनी चक्क हॉटेलमधील वेटरचे काम केले होते… असे सांगतात. या साहेबांच्या आयुष्यावर काही पुस्तके, चित्रफिती आणि नाटकेही निघाली होती. एकूणच अगदी दखल घेण्याजोगे, तमाम मराठी माणसांना आणि विशेषत: पोलिसात असणा-या सर्वांनाच अभिमान वाटावा, असे हे निवृत्त पोलिस अधिकारी आहेत… मधुकर बापूराव झेंडे त्यांचं नाव.

या साहेबांच्या पोलिस म्हणून केलेल्या कामगिरीवर चित्रपट निघाला पाहिजेच होता… पण कसा? जसे इतर शूर लोकांवर निर्माण केला जातो तसा… जसा एखाद्या ऐतिहासिक व्यक्तिरेखेवर काढला जातो तसा. पण… आपल्याच एका मराठी लेखक, दिग्दर्शकाने या शूर, कर्तव्यदक्ष आणि कर्तृत्ववान पोलिस अधिका-याचे जीवन पडद्यावर रेखाटताना चक्क विनोदी जॉनर वापरला आहे! Genre (जॉनर) म्हणजे प्रकार किंवा शैली. हे असं करणं हाच एक विनोद वाटावा. त्यापेक्षा या विषयावर मराठी वाहिन्यांवरील विनोदी कार्यक्रमात एखादे skit (नाट्यप्रवेश) सादर करून त्याचे शुटींग चित्रपट म्हणून दाखवले असते तर खर्च वाचला असता. नाहीतरी या चित्रपटात घेतलेले बरेच कलाकार अशाच skit मध्ये काम करण्यात वाकबगार झालेले आहेतच!

चित्रपटात नाव मात्र वास्तविक जीवनातील माणसाचे वापरायचे… अगदी पद सुद्धा तेच. इन्स्पेक्टर मधुकर बापूराव झेंडे. गोव्यातील पोलिस इन्स्पेक्टर विनोदी दाखवायचा आणि त्याच्या तोंडी झेंडे नावाचा उच्चार ‘जेंडे’ असा दाखवायचा…. यामागे काय विचार असावा? आंतरराष्ट्रीय गुन्हेगाराचा विषय असेल म्हणून असावे कदाचित, म्हणून चार्ल्स ऐवजी कार्ल (झेंडे साहेब मराठी म्हणून त्यांना कार्ल उच्चार करता येणार नाही म्हणून त्यांना कार.. लं म्हणायला लावायचं हे सुद्धा भारीच!) शोभराजचे भोजराज करणं अनिवार्य झालेलं असावं. कमीत कमी पदवीधर (इंग्लिश विषयासह) आणि महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोग अर्थात एम. पी. एस. सी. परीक्षा उत्तीर्ण झाल्यावरच पी. एस. आय. होता येतं! काही पोलिस अधिकारी modus operandi ला ऑपरंडाय ऐवजी ऑपरंडी म्हणत असतील सुद्धा… हा काही रूढ शब्दप्रयोग नाही पोलिसांचा!

मनोज वाजपेयी आता खरे पोलिस अधिकारी वाटू लागले आहेत. त्यांना मुख्य भूमिकेत घेऊन दिग्दर्शक, निर्मात्यांनी एक(च) बरे केले आहे! पण याही भूमिकेत दुसरा एखादा मराठी विनोदी कलाकार चालून गेला असताच!

झेंडे साहेबांचे सर्व सहकारी एकजात वेंधळे दाखवताना, साध्या भोळ्या चेह-याच्या भाऊ कदमांना चक्क पांडू हवालदारच दाखवले गेले आहे… आणि हे हवालदार साहेब चक्क घाबरट रंगवले गेले आहेत! ही पोलिसांची बदनामीच नव्हे काय? पांडू या शब्दाशी उच्चार जुळणारा एक मोठा शब्द मात्र वापराला जाईलच याचीही काळजी घेतली आहे. टांगा पलटी झाल्यावर घोडे फरार होतात… हे फरार होऊ पाहणा-या आरोपीस पकडताना म्हणले गेलेले खुपते प्रकारातले वाक्य वापरून आधीच अतिशय गंभीर असलेल्या प्रसंगात हलके फुलकेपणा आणण्याचा (केविलवाणा) प्रयत्नही झाला आहे. एक पोलिस (मग तो साधा भाऊ किंवा साध्या गणवेशातला का असेना) स्वत:च्या डोक्यात बादली (उपडी) घालून घेऊन गुन्हेगाराला त्या बादलीने धडक मारतो… किती अचूक दृश्य. ती बादली थेट गुन्हेगाराच्या डोक्यात नसती का घालता आली? असा बाळबोध प्रश्न पडायला पाहिजे खरं तर.

पण मधुकरराव झेंडे साहेबांची कामगिरी पहायला मोठ्या आशेने आणि उत्सुकतेने पडद्यासमोर बसलेल्या किमान मराठी माणसाला तरी या प्रश्नपत्रिकेतील एकही प्रश्न समजत नाही… सोडवायचा तर प्रश्नच येत नाही! या सवालांचे जबाब खुद्द लेखक, दिग्दर्शकाकडे तरी असतील का?

जगप्रसिद्ध पोलिस दलातील एका अधिका-याच्या जगप्रसिद्ध कामगिरीवर आधारीत चित्रपट लिहिताना, दिग्दर्शित करताना संबंधित लोकांनी पोलिसांना गृहीत धरले आहे की काय? खुद्द झेंडे साहेबांशी हे लोक संपर्कात असतीलच… म्हणजे असावेत. मग साहेबांनी याला कशी संमती दर्शवली? कलात्मक, अभिव्यक्ती स्वातंत्र्य म्हणायचे असेल तर कायदेशीरदृष्ट्या योग्यच आहे म्हणा! मग मधुकर झेंडे ऐवजी सुधाकर पांडे हे नाव काही कमी आकर्षक वाटले नसते!

आता विषय जगात पोहोचला आहे… तो काही परत घेता येणार नाही. पण यापुढील काळात पोलिसांच्या कर्तबगारीवर चित्रपट, नाटक काढताना संबंधित खात्यातील ज्ञानी, अनुभवी लोकांचा एकदा सल्ला घेतला गेला पाहिजे, असे वाटते.

आणि हो, भारतीय सैन्याविषयी चित्रपट, नाटक लिहिण्यापूर्वी, आणि ते प्रकाशित करण्यापूर्वी संरक्षण खात्यातील जाणकार लोकांना दाखवलेच जावे, असा नियम असावा. नाहीतर सैनिकी चित्रपटात प्राणार्पण केले असे दाखवले गेलेले सैनिक प्रत्यक्षात सुखरूपपणे जिवंत आहेत, असे नंतर समजते! Cinematic Liberty घेण्यापूर्वी सारासार विचार आपले कलाकार, लेखक, दिग्दर्शक कधी करणार? निर्मात्यांना काय… पैसे वसूल झाल्याशी मतलब!

(श्री. मधुकरराव बापूराव झेंडे साहेब यांच्या कामगिरीविषयी पुस्तके उपलब्ध आहेत. ती शोधून वाचावीत. आता OTT वर आलाच आहे, subscription केलेच आहे म्हणून कोणताही चित्रपट पाहण्यात काही हशील नाही, असे मला संपूर्ण चित्रपट पाहिल्यानंतर प्रामाणिकपणे वाटते. अर्थात, हा लेख म्हणजे माझेही अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे. काय पहायचं आणि काय नाही हे सर्वस्वी वैय्यक्तिक निर्णय असतो. न्यायासाठी उत्तम काम केलेल्या आणि करणा-या, प्रसंगी प्राणांचे बलिदान देणा-या सर्वच पोलिस अधिका-यांना, कर्मचा-यांना अभिवादन!)

© श्री संभाजी बबन गायके 

पुणे

9881298260

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ जगातील सर्वात मोठा शब्द… ☆माहिती संग्राहक : श्री दिवाकर बुरसे ☆

श्री दिवाकर बुरसे

? इंद्रधनुष्य ?

☆ जगातील सर्वात मोठा शब्द… माहिती संग्राहक : श्री दिवाकर बुरसे

संस्कृत भाषेतच असे चमत्कार घडू शकतात!

संस्कृत भाषेतील एका अतिविशाल शब्दाचा परिचय करून घेण्यापूर्वी या शब्दाच्या लेखिकेविषयी सांगणे आवश्यक आहे.

*राणी तिरुमलाम्बिका*

विजयनगर साम्राज्याने भारतीय कला, साहित्य, संस्कृति, संगीत याला महत्वपूर्ण आश्रय दिला होता. १५२९ ते १५४२ या काळात अच्युतदेवराय हे सम्राट होते. त्यांची राणी तिरुमलाम्बिका या अतिविदुषी होत्या. तिरुमलाम्बिका यांना “राजाधिराजाच्युतरायसार्वभौमप्रेमसर्वस्वविश्वासभुवा” (राजाधिराज अच्युतराय सार्वभौम यांचे प्रेम व सर्वस्व विश्वास संपादन केलेली) असे म्हटले गेले आहे. त्यांचे संस्कृत भाषेखेरीज अनेक भाषांवर प्रभुत्व होते. त्या काव्ये नाटके, काव्यशास्त्र, वेद आणि पुराणांच्या ज्ञात्या होत्या. चम्पू काव्य शैलीत त्यांनी लिहिलेला – *वरदाम्बिकापरिणयचम्पूः*

(वरदाम्बिकाच्या विवाहाचे गद्यपद्यमय काव्य) हे संस्कृतातील मनोहरी काव्यांपैकी एक काव्य आहे.

कवी बाणभट्ट हे संस्कृत गद्यात दीर्घ सामासिक शब्दांच्या प्रयोगासाठी विख्यात आहेत पण तिरुमलाम्बिका सुद्धा या कलेत त्यांच्या तुलनेत जराही मागे नाहीत. चम्पू काव्याच्या रूपातील दीर्घ शब्दप्रयोग केलेली ही कृती पद्यमय असल्याने फार सरस आणि वाचनीय झाली आहे.

या काव्यातील एक खण्ड ‘तुण्डीरदेशवर्णनम्’, यात पुढे दिलेला प्रसिद्ध शब्द मिळतो. याला संस्कृत भाषेतला सर्वात मोठा शब्द मानतात. *छप्पन्न शब्दांशांनी आणि एकशे एक्याण्णव अक्षरांनी रचलेला हा शब्द* अनेक विशेषणे उपसर्ग, प्रत्ययांनी विभूषित आहे :—

*निरन्तरान्धकारितदिगन्तरकन्दलदमन्दसुधारसबिन्दुसान्द्रतरघनाघनवृन्दसन्देहकरस्यन्दमानमकरन्दबिन्दुबन्धुरतरमाकन्दतरुकुलतल्पकल्पमृदुलसिकताजालजटिलमूलतलमरुवकमिलदलघुलघुलयकलितरमणीयपानीयशालिकाबालिकाकरारविन्दगलन्तिकागलदलालवङ्गपाटलघनसारकस्तूरिकातिसौरभमेदुरलघुतरमधुरशीतलतरसलिलधारानिराकरिष्णुतदीयविमलविलोचनमयूखरेखापसारितपिपासायासपथिकलोकान्*

वरील अति दीर्घ सामासिक शब्दातील एकेका शब्दाचा /शब्दांशाचा अर्थ:

  • निरन्तरान्धकारित (सदा अंधारात वास्तव्य करणारा)
  • दिगन्तर (अन्यत्र)
  • कन्दलदमन्द (फळा फुलांनी युक्त)
  • सुधारस (फुलांतील मध)
  • बिन्दु (थेंब, कण)
  • सान्द्रतर (उत्कट, प्रबळ)
  • घनाघन (इन्द्र; वर्षाव करणारे मेघ)
  • वृन्द (दल)
  • सन्देहकर (सन्देह, संशय उत्त्पन्न करणारा)
  • स्यन्दमान (चन्द्रमा; प्रवाहित, वाहणारा)
  • मकरन्द (फुलातील मध)
  • बिन्दु (थेंब, कण)
  • बन्धुरतर (सुखद, सुदर, आकर्षक)
  • माकन्द (आम्र वृक्ष; माकन्दी पिवळे चन्दन)
  • तरु (वृक्ष)
  • कुल
  • तल्प (आसन, रक्षक)
  • कल्प (सक्षम, नृत्य)
  • मृदुल (सुकोमल, जल)
  • सिकता (वाळू)
  • जाल (जाळे)
  • जटिल (गुंतागुंतीचे)
  • मूल (मूळ)
  • तल
  • मरुवक (एक प्रकारची तुळस)
  • मिलद (मिळत असलेले)
  • लघु (लहान)
  • लघु (लहान)
  • लय (स्वराची मधुरता)
  • कलित (गुणगुणणारे, प्रेरित)
  • रमणीय (मनोरम)
  • पानीय (पोषित, संरक्षित, पाणी)
  • शालिका (कुटि, घर)
  • बालिका (कन्या)
  • करारविन्द (कमळासारखे हात.)
  • गलन्तिका (पाण्याचा झरा)
  • गलदेला (एक प्रकारचे गवत)
  • लवङ्ग (लवंग वृक्ष)
  • पाटल (गुलाब)
  • घनसार (कर्पूर, कपूर)
  • कस्तूरिकातिसौरभ (अतिशय सुगंधितत कस्तुरी)
  • मेदुर (चिकणे, घने)
  • लघुतर (लहान)
  • मधुर (गोड)
  • शीतलतर (अधिक गार)
  • सलिलधारा (जलधारा)
  • निराकरिष्णु (निरोधक, अडवणारा)
  • तदीय (त्यांचे)
  • विमल (स्वच्छ, सुन्दर)
  • विलोचन (नेत्र, दर्शन)
  • मयूख (प्रकाश किरणें)
  • रेखापसारित (रेषांनी विखुरले (अपसारित))
  • पिपासायास (तहानेलेले (पिपासु), थकलेले (आयास))
  • पथिक (प्रवासी)
  • लोकान् (मनुष्य)

खरे तर या शब्दाची संपूर्ण व्याख्या लिहायला अनेक पृष्ठे लागतील. पण याचा भावार्थ सांगायचा झाला तर तो असा सांगता येईल :

या प्रवाश्यांना तहानेमुळे होणा-या त्रासाचे निवारण या कन्यांच्या वेधक नेत्रांतील किरणांच्या गुच्छामुळे केले, प्रकाशकिरणे जी जलधारांवर हिलोरत होती, वेलची, लवंग, केशर, कापूर आणि कस्तुरी यांनी सुगंधित झालेल्या मधुर व शीतल जलाला कुमारींच्या कमळासारख्या हातात धारण केलेल्या घड्यांत, त्यांची पावले सुकोमल रेतीच्या पायघड्यांवर पडत होती नवमंजि-यांनी डवरलेल्या आम्रतरूंराजीमधे असलेल्या भूभागावर अंधार करीत होते आणि गुलाबादि फुलांतून टपकणा-या रसाच्या थेंबांमुळे आधिकच आकर्षक वाटत होती जशी मेघांची रांग घनदाट वर्षायुक्त मेघांची रांगेचा भ्रम निर्माण करते ज्यात विपुल प्रमाणात अमृतासम जल ओथंबले आहे.

माहिती संग्राहक : श्री  दिवाकर बुरसे

पुणे

संपर्कः ९२८४३००१२५, ९५५२६२९२४५

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ आमची आई ☆ सुश्री संध्या बेडेकर ☆

सुश्री संध्या बेडेकर

? मनमंजुषेतून ?

☆ आमची आई ☆ सुश्री संध्या बेडेकर ☆

आमची ‘आई ‘म्हणजे एक प्रसन्नचित्त व्यक्तिमत्त्व. ••सर्वांचे लक्ष ठेवणारी.

‘आई ‘ या शब्दाची perfect ‘व्याख्या’ आणि ‘उदाहरण’ म्हणजे आमची ‘आई ‘. •• तिचे जग म्हणजे घर, मुल, नवरा. •• त्यात ती एवढी रमते की तिला व्यायामाला वेळच मिळत नाही. •असं तिचे म्हणणे असते. •• एक व्यायाम सोडला तर इतर कामे ती अगदी हुशारीने, आनंदाने, आवडीने, करण्यास तत्पर असते ••. फक्त थोडी दबक्या स्वभावाची आहे. •• त्यामुळे सर्वांशी पटत. •• पण तिच्या स्वभावाचा फायदा घेणारे बरेच असतात••. पटकन कोणाच्याही म्हणण्यात येते ••. कोणी काही म्हंटल तर लगेच त्याचा विचार करत बसते. हिरमुसते ••म्हणून आम्हाला तिच्या कडे लक्षच ठेवावे लागते •••. बरे असो..

खूप समजविल्यानंतर शेवटी नाईलाजाने का होईना पण ती आता सकाळी फिरायला जाऊ लागली. ••तिला आता आवडू ही लागल आहे. ••काल अचानक फिरून आल्यावर थोडी ‘disturb ‘वाटली. •• थोड्याच वेळात तिच्या बोलण्यातून लक्षात आले, की तिला शेजारच्या काकू भेटल्या होत्या. ••• ••लक्षात आलं काही तरी बोलण झाल असाव दोघींमधे. •• कळेलच. आई काही खूप वेळ मनात ठेवणार नाही. •••

थोड्या वेळात कळलेच सर्व.

शेजारच्या काकू म्हणजे अगदी regular walk, exercise करणाऱ्या. •• त्या आईला भेटल्या. •• तर लगेच म्हणाल्या अरे.! आज काय सूर्य पश्चिमेला उगवला का? काय??? आज अगदी walk ला वगैरे! . सर्व ठीक ना. तब्येत वगैरे •••. काय??? डॉक्टर ने सांगितले की काय??? BP वगैरे ठीक ना. •• अग!! पण असं डोलत डोलत चाललीस तर, काही उपयोग होणार नाही •••. जरा स्पीड वाढव. •• तरच वर्ष सहा महिन्यांत काही फरक पडेल. ••• उद्या पासून माझ्या बरोबर चल. •• छान चार, पाच किलोमीटर चालत चक्कर मारून येत जाऊ••••• 

काकूंच्या बोलण्याची speed तर बुलेट ट्रेन च्या speed पेक्षाही जास्त होती.

बाप रे!! एका दमात एवढं सर्व •••..

आमची आई काकूंच्या या लांबलचक भाषणाने घाबरूनच गेली. •••आधीच खूप उत्साह होता ••. त्यात ही अशी भर पडली ••. आणि त्यात तसा स्वभाव. ••• झालं आता, मग काय कारणच मिळाले की मला जमणार नाही म्हणून. •••.

खरंच काही लोक बेफाम सुटतात. •• एवढ्या लांब लचक भाषणा ऐवजी, फक्त एवढं म्हंटल असतं अरे व्वा!! छान वाटलं ग, तुला बघुन. •• चला म्हणजे आता रोज सकाळी आपली भेट होणार. •• सर्व मजेत ना.

एवढं पुरेसं होतं समोरच्याला प्रोत्साहन द्यायला. व स्वतः चा मान टिकवायला. या दोन वाक्यात तुमची काळजी, प्रेम, आधार, आश्चर्य, चौकशी सर्व सामावले असते ••.. देवानें सर्वांना ओठ धनुष्याच्या आकाराचे दिलेले आहेत. पण त्यातून शब्दांचे बाण असे सोडा जे समोरच्या च्या हृदयाला छेद नाही, तर हळुवार स्पर्श करतील. •••. पण प्रतिसाद देणारे कमी व प्रतिक्रिया देणारे नेहमीच जास्त भेटतात •••. जर प्रत्येकाने आपल्या मना बरोबर दुसऱ्या च्या मनाचाही विचार केला तर असं होणार नाही. थोडे कोमल उत्साह वर्धक शब्द वापरता आले पाहिजे ••••.

काय आणि किती आणि कोणाचे ऐकायचे हे आपण ठरवायचे असते. •• शब्द मनात झिरपू द्यायचे की कानावरूनच परतवून लावायचे. ••• खूप सज्जन व‌ प्रामाणिक राहिले आणि गरजेपेक्षा जास्त लक्ष व वेळ लोकांना दिला तर ते आपल्याला ‘फालतू’ समजतात. ••• गृहित धरतात. •••त्यामुळे प्रत्त्येक वेळी कसा ‘ stand ‘ घ्यायचा हे ठरविता आले पाहिजे. •••.

म्हणतात ना••• विचार filter करता आले पाहिजे. ••

 बाबांच्या लक्षात आले, ते म्हणाले, •••अग!! तू आपल्या स्पीड ने चाल. •••कासवाच्या गतीने का होईना रोज थोडी थोडी प्रगती कर. ••अग!! खूप ससे आडवे येतील. ••बस, त्यांच्या कडे दुर्लक्ष करायची हिम्मत ठेव. •••

जेमतेम आठ दिवस झाले तूला सुरवात करून. ••हळूहळू होईल सराव. •• आता त्या काकूंचे ऐकून तू आपले फिरणे बंद करू नकोस. • एवढं disturb व्हायला काय झालं???

प्रत्त्येकाचे काही specific क्षेत्र असते. •• त्यात तो उत्तम असतो ••. जसं तुला स्वयंपाक म्हंटला की तू कशी एकदम उत्साहाने कामाला लागते. ••अगदी पंधरा वीस जणांचे स्वयंपाक करणे, म्हणजे ‘बाएं हात का खेल आहे ‘ तुझ्या करिता. ••••

ते जमत का त्या काकुंना??? नाही ना. ••

एक व्यक्ती सगळ्याच जागी उत्तम कसा असू शकतो.??? अग, हा व्यायाम तुझ्या करिता गरजेचा आहे. •• तुला काय मेराथॉन मधे पन्नास ‌किलोमीटर चालायचे आहे का??? फक्त स्वतः च्या प्रकृती कडे लक्ष दे. •• अग!! आता खूप झाले स्वयंपाक आणि मुलांकडे लक्ष देणे••. आता स्वतः कडे लक्ष दे ••. स्वतः च्या आवडी निवडी जप. ••लोकांच्या बोलण्याकडे लक्ष देऊ नको. ••• 

काही जण विचार न करता खूप बोलतात••त्यांच्या कडे दुर्लक्ष करायला शिक. किंवा उत्तर द्यायला शिक. •••

एक फुलपाखरू फक्त चौदा दिवस जीवन जगतो. पण किती बागडत ते. आयुष्याचा पूर्ण आनंद तो त्या तेवढ्या छोट्याशा आयुष्यात घेतो. ••••

तेंव्हा आता आपल्या आयुष्याची दिशा जरा बदल. •• तु आज पर्यंत घरासाठी खूप केले. •• आता स्वतः करिता जग. •• स्वतः च्या प्रकृती ची काळजी घे. •• बाबा पूढे म्हणाले, •••

अग! तुला ही पूर्ण हक्क आहे, आपल्या मनासारखं जगण्याचा. •••शरीर थकलं तरी मन कधीच थकत नाही. मनाला मनसोक्त उडू द्यावे. •••• 

प्रत्येक घरात अशी माणसे असावीत. जी एकमेकांचा विचार करतील. ••वेळेवर सावरतील. ••सांभाळतील. •• विचार परिवर्तन आणतील. •• योग्य सल्ला देतील. •• विचारांना दिशा देतील. ••आयुष्य म्हणजे राब राब राबणे नव्हे. ••तर आपापल्या परीने enjoy पण करता आले पाहिजे. •••वेळेवर बोललेले दोन‌ शब्द पूढच्या उद्भवणाऱ्या अनेक प्रश्नांची शक्यता कमी करतात. ••• यालाच योग्य सल्ला देणे, किंवा ‘ counseling’ करणे म्हणतात ••••. प्रत्येकाचा आदर करणे, समंजसपणे वागणे, समजून घेणे, समजावीणे ज्या घरात जमते. त्या घरात सूख -शांती समाधान असते तेच त्यांच्या घरचे वास्तूशास्त्रज्ञ असतात ••. त्यांच्या असण्यानेच. घरात सकारात्मक उर्जा असते. •• विश्वास असतो. ••••

आपण जन्माला आलो आहोत ते गेलेले दिवस मोजण्यासाठी नाही, तर उरलेल्या दिवसांचा आनंद व उपभोग घेण्यासाठी. ••यांचे स्मरण असावे. ••••

म्हणतात ना•••• 

“मार्गदर्शन सही हो तो एक नन्हा-सा दीपक भी किसी सूरज से कम नही “।. ••••

© सुश्री संध्या बेडेकर 

वारजे, पुणे. 

7507340231

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares