श्री संदीप रामचंद्र सुंकले
इंद्रधनुष्य
☆ ।। श्री नारद उवाच ।। – नारद भक्ति सूत्रे — सूत्र ३० ☆ श्री संदीप रामचंद्र सुंकले ☆
।। श्री नारद उवाच ।।
नारद भक्ती सूत्र क्र. ३०.
स्वयंफलरूपतेति ब्रह्मकुमाराः ॥ ३० ॥
अर्थ : ब्रह्मदेवाचे पुत्र (सनकादिक तसेच नारद) भक्ती स्वयंफलरूप आहे असे म्हणतात.
विवेचन : भक्ती ही साधन मानली तर तिचे महत्त्व राहणार नाही. तसेच तिला ज्ञानादिकाचे साध्य मानले तरी पारतंत्र्य प्राप्त होते किंवा अन्योन्याश्रयत्व दोष प्राप्त होतो हे पूर्वीच्या सूत्रावरील विवरणात सांगितले आहे. ही दोन्ही मते नारदांना मान्य नसावीत म्हणून या सूत्रात नारद म्हणतात, ती स्वयंफलस्वरूप आहे.
भक्तीची स्वयंफलरूपता नारदांनी सूत्र सव्विसाव्यात ‘फलरूपत्वात्’ म्हणून सांगितलीच आहे. सनकादिक व नारद या उभय ब्रह्मकुमारांच्या मते भक्ती ही कोणाचे साध्य नाही व कोणाचे साधन नाही; ती स्वतःच फलस्वरूप आहे, तीच साध्य व तीच साधन आहे. ज्ञानाने भक्ती किंवा भक्तीने ज्ञान हे मत त्यांना मान्य नाही. ती स्वयंफलस्वरूपा कशी आहे याचे विस्तारपूर्वक विवरण, सव्विसाव्या सूत्रावर केले गेलेच आहे. कोणी म्हणेल की कोणते तरी साधन केल्याविना भक्ती तरी कशी प्राप्त होणार? कोणत्याही गोष्टीचा अनुभव घेतल्याशिवाय त्याबद्दल मत प्रगट करणे अन्यायकारक होऊ शकते. आपण नामस्मरण भक्तीचे उदाहरण पाहू. कोणतेही नाम घेताना, कोणालाही सुरुवातीला त्याचा कंटाळाच येतो, हा जवळजवळ सर्वांचा अनुभव असेल. पण श्रीयुत तुकाराम आंबिले यांना त्यांच्या गुरूंनी स्वप्नात नाम दिले. त्यांनी त्या नामाचा घोषा लावला….! न कंटाळता, न थकता, प्राप्त परिस्थितीचा स्वीकार करीत, अगदी भंडाऱ्याच्या डोंगरावर जाऊन नाम घेतले…..! शेवटी एक वेळ अशी आली की श्री. तुकाराम आंबिले यांचे #”आकाशा एवढ्या तुक्यात”# रुपांतरण झाले….! हे सर्व परिवर्तन निव्वळ नामस्मरणाने झाले असे संत तुकाराम महाराज यांचे चरित्र वाचले की लक्षात येईल.
सामान्य मनुष्याच्या अंगी असलेल्या उपजत *गुणां*मुळे त्याच्यात भगवद्विमुखता, विषयवासना, अश्रद्धा हे असे अनेक रोग असतात, त्यामुळे त्याला भक्तीमार्ग गोड लागत नाही. पूजेत, भजनात, ध्यानात आनंद होत नाही; रुची निर्माण होत नाही. याचे औषधही हेच आहे की नामस्मरण सतत करीत राहणे. ते नाम ते सर्व विकार दूर करते, हृदयशुद्धी होते. मग संत तुकाराम महाराज म्हणतात,
नाम घेतां मन निवे । जिव्हे अमृतचि स्रवे *होताती बरवे । ऐसे शकुन लाभाचे ॥०१॥ मन रंगलें रंगलें । तुझ्या चरणीं स्थिरावलें । केलिया विठ्ठलें । ऐसी कृपा जाणावी ॥०२॥ जालें भोजनसें दिसे । चिरा पडोनि ठेला इच्छे । धालियाच्या ऐसें । अंगा येती उद्गार ॥०३॥ सुख भेटों आलें सुखा । निध सांपडला मुखा तुका म्हणे ||०४||”
संदर्भ: अभंग क्रमांक ८८४, सार्थ तुकाराम गाथा धार्मिक प्रकाशन संस्था)
तुकाराममहाराजांनी प्रथम आपल्या वाणीस नाम घेण्याची प्रेरणा दिली.
“घेई घेई माझे वाचे | गोड नाम विठोबाचे || १ ||
डोळे तुम्ही घ्यारे सुख | पाहा विठोबाचे मुख || २ ||
तुम्ही आइका रे कान | माझ्या विठोबाचे गुण || ३ ||
मन तेथे धाव घेई | राही विठोबाचे पायी || ४ ||
तुका म्हणे जीवा | नको सोडू या केशवा || ५ ||”
– – संत तुकाराम महाराज सतत नामाच्या मागे लागले, मनात असेल किंवा नसेल पण वाचेवर नाम वसोदे, असा नामजप, भजन चालू झाले. मग त्यांना पुढील प्रमाणे अनुभव आला…
“विषयीं विसर पडिला निःशेष । अंगीं ब्रम्हरस ठसावला ॥१॥
माझी मज झाली अनावर वाचा । छंद या नामाचा घेतलासे ॥२॥
लाभाचिया सोसें पुढें चाली मना । धनाचा कृपणा लोभ जैसा ॥३॥
तुका म्हणे गंगासागरसंगमीं । अवघ्या जाल्या ऊर्मी एकमय ॥४॥”
(संदर्भ: अभंग क्रमांक १०३५, सार्थ तुकाराम गाथा धार्मिक प्रकाशन संस्था)
– – नामस्मरण भक्ति करता करता श्री. तुकाराम आंबिले ते संत तुकाराम महाराज हा प्रवास सुलभतेने घडून आला……!
… “स्वयंफलरूपता“ म्हणतात ती हीच एक अलौकिक अवस्था आहे.
!! जय जय रघुवीर समर्थ !!
!! नारद महाराज की जय!!!
– क्रमशः लेख क्र. ६
© श्री संदीप रामचंद्र सुंकले (दास चैतन्य)
थळ, अलिबाग.
८३८००१९६७६
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈






















