श्री दिवाकर बुरसे
इंद्रधनुष्य
☆ ‘लवथवती विक्राळा…’ ☆ श्री दिवाकर बुरसे ☆
“लवथवती विक्राळा”
— शिवतत्त्वाच्या विश्वात्म दर्शनाचे महाकाव्य.
(रवि १५ फेब्रु. २०२६ रोजी महाशिवरात्र आहे. त्यानिमित्त)
☆
प्रस्तावना
महाराष्ट्राच्या भक्तिपरंपरेत काही रचना अशा आहेत की त्या केवळ ऐकल्या किंवा म्हटल्या जात नाहीत, तर साक्षात जगल्या जातात. समर्थ रामदासस्वामी विरचित “लवथवती विक्राळा” ही शंकरांची आरती त्यापैकीच एक. घराघरांत नित्यनेमानं उच्चारली जाणारी ही आरती वरवर साधी वाटली, तरी तिच्या गर्भात शिवतत्त्वाचं अत्यंत गहन, विश्वात्म आणि अद्वैतदर्शी चिंतन सामावलेलं आहे. ही आरती म्हणजे केवळ स्तुतीगीत नसून, शिव या तत्त्वाची अनुभूती देणारं भव्यदिव्य तत्त्वकाव्य आहे.
विक्राळतेचं तत्त्वज्ञान
आरतीचा आरंभ —
“लवथवती विक्राळा ब्रह्मांडी माळा”
या ओळीनं होतो. इथे समर्थ शंकरांचं सौम्य रूप पुढे न आणता त्यांची विक्राळता उभी करतात. मात्र ही विक्राळता हिंसक नसून अज्ञानाला हादरवणाऱ्या सत्याची आहे. “ब्रह्मांडी माळा” या एका शब्दातून संपूर्ण विश्व शंकरांच्या कंठाभोवती गुंफलं जातं. शिव इथे एखाद्या विशिष्ट स्थानी विराजमान असलेले देव न राहता, संपूर्ण विश्व व्यापून उरणारं चैतन्य ठरतात—विश्वात असूनही विश्वापलीकडचे.
*विष, करुणा आणि साक्षीभाव*
“वीषें कंठ काळा त्रिनेत्रीं ज्वाळा”
या ओळीत समुद्रमंथनाची पुराणकथा येते. देव-दैत्यांच्या संघर्षातून निघालेलं हळाहळ विष शंकरांनी प्राशन केलं; मात्र ते कंठातच रोधून धरलं. त्यामुळे त्यांचा कंठ निळा झाला.
या कृतीचा तात्त्विक अर्थ अत्यंत सूक्ष्म आहे. शिव दुःख नष्ट करत नाहीत. ते दुःख स्वतःमध्ये सामावून घेतात; पण त्याचा प्रसार इतरत्र होऊ देत नाहीत. “त्रिनेत्रातील ज्वाळा” म्हणजे संहाराची आग नव्हे, तर भूत–वर्तमान–भविष्य या तिन्ही काळांचं जागृत ज्ञान. शिव म्हणजे संहारक नाही, तर सजग साक्षीपुरुष.
रौद्रता आणि सौम्यतेचा अद्वैत संगम
हे विक्राळ रूप पुढच्याच ओळीत सौंदर्यात विलीन होतं —
“लावण्यसुंदर मस्तकीं बाळा”
शंकर लावण्यवान आहेत. त्यांच्या मस्तकावर ‘बाळा’ म्हणजे गंगा आहे. स्वर्गातून प्रचंड वेगानं येणाऱ्या गंगेला आपल्या जटाभारात सामावून, तिचा वेग रोखून पृथ्वीवर केवळ कल्याणकारी सौम्य धार सोडली—म्हणून समर्थ गंगेला ‘बाळा’ म्हणतात.
शिवाच्या मस्तकावरला चंद्र शीतलतेचं आणि संतुलनाचं प्रतीक आहे. रौद्रता आणि सौम्यता, भय आणि करुणा — या विरोधी भासणाऱ्या गुणांचा अद्वैत संगम म्हणजे शिवतत्त्व. जिथं चंद्र आहे, तिथं अंधार असला तरी शीतल प्रकाश असतो.
चैतन्याचा प्रवाह
“तेथुनियां जल निर्मळ वाहे झुळझूळां”
या ओळीत गंगेचं अवतरण दिसतं. शंकरांच्या जटांमधून वाहणारी गंगा केवळ पौराणिक नदी नाही, तर साक्षात चैतन्याचा, करुणेचा आणि पवित्रतेचा अखंड प्रवाह आहे. संहारक मानला जाणारा शिवच जीवन टिकवून ठेवतो—ही विसंगती नसून हे पूर्णत्व आहे.
कर्पूरगौर शिव : अहंकारशून्य तेज
धृवपदातील “कर्पूरगौरा” या शब्दातून शिव अत्यंत गोरे असल्याचं सांगितलं आहे. कापूर जसा जळून पूर्णपणे नाहीसा होतो, तसा शिव अहंकारशून्य आहे. भोळेपणा म्हणजे दुर्बलता नाही, तर निर्मळ भावावर प्रसन्न होणारी सहज दैवी वृत्ती आहे. विशाल नेत्र म्हणजे सर्वांना सामावून घेणारं अपरंपार वात्सल्य, कारुण्य.
अर्धनारीनटेश्वर : अद्वैताचा कळस
“अर्धांगीं पार्वती”
या ओळीत अर्धनारीनटेश्वर तत्त्व प्रकट होतं. शिव आणि शक्ती वेगळे नाहीत — चेतना आणि क्रिया, पुरुष आणि प्रकृती यांचं द्वैत इथं विरघळतं. त्यामुळे शिवतत्त्व हे केवळ वैराग्याचं प्रतीक न राहता, संतुलित, समन्वयी आणि समग्र जीवनदृष्टीचं प्रतीक ठरतं.
भस्म : वैराग्याची जागृती
“विभुतीचें उधळण शितिकंठ नीळा”
विभूती म्हणजे भस्म. शिव सर्वांगावर चिताभस्म धारण करतात. भक्त शिवावर चिताभस्माची उधळण करतात. भस्म ही मृत्यूची आठवण आहे; पण निराशेची नाही—ती वैराग्याची जागृती आहे.
समुद्रमंथनाच्या कथेत अमृताआधी विष येतं. हा निव्वळ पौराणिक तपशील नसून मानवी जीवनाचा शाश्वत नियम आहे. साधना असो वा संसार—संघर्षाविना अमृत मिळत नाही. शिव विष पितात, पण ते गिळून टाकत नाहीत—हेच शिवतत्त्वाचं जीवनसूत्र आहे.
योगी शिव
आरतीच्या अखेरच्या कडव्यात शिव योगी रूपात प्रकट होतात—
“व्याघ्रांबर, फणिवरधर, सुंदर मदनारी”
भय, काळ आणि वासना यांवर विजय मिळवलेला शिव इंथ योगी आहे.
_“पंचानन मनमोहन मुनिजनसुखकारी”
शिव पंचमुखी आहेत. ईशान, तत्पुरुष, अघोर, वामदेव, सद्योजात—किंवा पंचमहाभूते, पंचज्ञानेंद्रिये आणि सृष्टीची पाच कार्यं यांची प्रतीकात्मक अभिव्यक्ती म्हणजे पंचानन शिव.
“शतकोटीचें बीज वाचे उच्चारी”
ॐ या एकाक्षरी प्रणवात संपूर्ण सृष्टी सामावलेली आहे. स्वयं शिव या नादात सदा मग्न आहेत.
राम–शिव अद्वैत
“रामदासा अंतरीं”
या उल्लेखातून समर्थ स्वतःला रामभक्त म्हणवतात. ते म्हणतात की, रघुकुलातील सर्वश्रेष्ठ पुरुष श्रीराम माझ्या हृदयी विराजमान आहे. रामाच्या अंतःकरणात शिव वास करतो; म्हणजेच रामदासाच्याही अंतःकरणात शिवच वास करतो. राम आणि शंकर वेगळे राहत नाहीत—इथं भक्तीतलं अद्वैत अतिशय सूक्ष्मपणे समर्थांनी उलगडलंय.
काव्यमीमांसा
या तात्त्विक गहनतेला न्याय देणारं समर्थांचं काव्यप्रभुत्व तितकंच विलक्षण आहे. विषयाला साजेसं ठेकेदार, गंभीर वृत्त, ओघवती लय आणि अर्थघन शब्दयोजना यांमुळे आरती उच्चारताना ती केवळ ऐकू येत नाही, तर अनुभवली जाते.
‘लवथव’, ‘विक्राळ’, ‘ब्रह्मांडमाळा’, ‘मदनारी’, ‘फणिवरधर’ हे शब्द अलंकार म्हणून नाही, तर तत्त्वसूचक चिन्हं म्हणून येतात. प्रथम कडव्यातील ‘ल’ आणि ‘ळ’ वर्णांचा अनुप्रास श्रुतिमधुर वाटतो.
*विरोधाभासातून परिणाम साधणारी कलाकृती*— विक्राळ पण लावण्यसुंदर, संहारक पण करुणाकर — असं शिवरूप भक्ताच्या मनात खोलवर स्थिरावतं.
समारोप
अशा प्रकारे _“लवथवती विक्राळा”_ ही आरती शिवाची स्तुती न राहता शिव होण्याची दिशा दाखवणारं तत्त्वकाव्य ठरतं. म्हणूनच ती शतकानुशतकं टिकून आहे. ती देवाला माणसाजवळ आणत नाही; उलट माणसाला अधिक विशाल, अधिक सजग आणि अधिक शिवमय बनवते. हेच या आरतीचं खरं यश आहे.
॥ ॐ शिव शंकराय नमः ॥
॥ समर्थकृत शंकराची आरती ॥
लवथवती विक्राळा ब्रह्मांडी माळा ।
वीषें कंठ काळा त्रिनेत्रीं ज्वाळा ॥
लावण्यसुंदर मस्तकीं बाळा ।
तेथुनियां जल निर्मळ वाहे झुळझूळां ॥ १ ॥
*
जय देव जय देव जय श्रीशंकरा ।
आरती ओवाळूं तुज कर्पूरगौरा ॥ ध्रु० ॥
*
कर्पूरगौरा भोळा नयनीं विशाळा ।
अर्धांगीं पार्वती सुमनांच्या माळा ॥
विभुतीचें उधळण शितिकंठ नीळा ।
ऐसा शंकर शोभे उमावेल्हाळा ॥ जय देव० ॥ २ ॥
*
देवीं दैत्यीं सागरमंथन पै केलें ।
त्यामाजीं अवचित हळाहळ जें उठिलें ॥
तें त्वां असूरपणें प्राशन केलें ।
नीळकंठ नाम प्रसिद्ध झालें ॥ जय देव० ॥ ३ ॥
*
व्याघ्रांबर फणिवरधर सुंदर मदनारी ।
पंचानन मनमोहन मुनिजनसुखकारी ॥
शतकोटीचें बीज वाचे उच्चारी ।
रघुकुळटिळक रामदासा अंतरीं ॥ जय देव जय देव० ॥ ४ ॥
☆
llजय जय रघुवीर समर्थ ll
© श्री दिवाकर बुरसे
पुणे
संपर्कः ९२८४३००१२५, ९५५२६२९२४५
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈






















