मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ ‘लवथवती विक्राळा…’ ☆ श्री दिवाकर बुरसे ☆

श्री दिवाकर बुरसे

? इंद्रधनुष्य ?

☆ ‘लवथवती विक्राळा…’ ☆ श्री दिवाकर बुरसे

“लवथवती विक्राळा

 शिवतत्त्वाच्या विश्वात्म दर्शनाचे महाकाव्य.

 (रवि १५ फेब्रु. २०२६ रोजी महाशिवरात्र आहे. त्यानिमित्त) 

प्रस्तावना

महाराष्ट्राच्या भक्तिपरंपरेत काही रचना अशा आहेत की त्या केवळ ऐकल्या किंवा म्हटल्या जात नाहीत, तर साक्षात जगल्या जातात. समर्थ रामदासस्वामी विरचित “लवथवती विक्राळा” ही शंकरांची आरती त्यापैकीच एक. घराघरांत नित्यनेमानं उच्चारली जाणारी ही आरती वरवर साधी वाटली, तरी तिच्या गर्भात शिवतत्त्वाचं अत्यंत गहन, विश्वात्म आणि अद्वैतदर्शी चिंतन सामावलेलं आहे. ही आरती म्हणजे केवळ स्तुतीगीत नसून, शिव या तत्त्वाची अनुभूती देणारं भव्यदिव्य तत्त्वकाव्य आहे.

विक्राळतेचं तत्त्वज्ञान

आरतीचा आरंभ —

“लवथवती विक्राळा ब्रह्मांडी माळा”

या ओळीनं होतो. इथे समर्थ शंकरांचं सौम्य रूप पुढे न आणता त्यांची विक्राळता उभी करतात. मात्र ही विक्राळता हिंसक नसून अज्ञानाला हादरवणाऱ्या सत्याची आहे. “ब्रह्मांडी माळा” या एका शब्दातून संपूर्ण विश्व शंकरांच्या कंठाभोवती गुंफलं जातं. शिव इथे एखाद्या विशिष्ट स्थानी विराजमान असलेले देव न राहता, संपूर्ण विश्व व्यापून उरणारं चैतन्य ठरतात—विश्वात असूनही विश्वापलीकडचे.

*विष, करुणा आणि साक्षीभाव*

“वीषें कंठ काळा त्रिनेत्रीं ज्वाळा”

या ओळीत समुद्रमंथनाची पुराणकथा येते. देव-दैत्यांच्या संघर्षातून निघालेलं हळाहळ विष शंकरांनी प्राशन केलं; मात्र ते कंठातच रोधून धरलं. त्यामुळे त्यांचा कंठ निळा झाला.

या कृतीचा तात्त्विक अर्थ अत्यंत सूक्ष्म आहे. शिव दुःख नष्ट करत नाहीत. ते दुःख स्वतःमध्ये सामावून घेतात; पण त्याचा प्रसार इतरत्र होऊ देत नाहीत. “त्रिनेत्रातील ज्वाळा” म्हणजे संहाराची आग नव्हे, तर भूत–वर्तमान–भविष्य या तिन्ही काळांचं जागृत ज्ञान. शिव म्हणजे संहारक नाही, तर सजग साक्षीपुरुष.

रौद्रता आणि सौम्यतेचा अद्वैत संगम

हे विक्राळ रूप पुढच्याच ओळीत सौंदर्यात विलीन होतं —

“लावण्यसुंदर मस्तकीं बाळा”

शंकर लावण्यवान आहेत. त्यांच्या मस्तकावर ‘बाळा’ म्हणजे गंगा आहे. स्वर्गातून प्रचंड वेगानं येणाऱ्या गंगेला आपल्या जटाभारात सामावून, तिचा वेग रोखून पृथ्वीवर केवळ कल्याणकारी सौम्य धार सोडली—म्हणून समर्थ गंगेला ‘बाळा’ म्हणतात.

शिवाच्या मस्तकावरला चंद्र शीतलतेचं आणि संतुलनाचं प्रतीक आहे. रौद्रता आणि सौम्यता, भय आणि करुणा — या विरोधी भासणाऱ्या गुणांचा अद्वैत संगम म्हणजे शिवतत्त्व. जिथं चंद्र आहे, तिथं अंधार असला तरी शीतल प्रकाश असतो.

चैतन्याचा प्रवाह

“तेथुनियां जल निर्मळ वाहे झुळझूळां”

या ओळीत गंगेचं अवतरण दिसतं. शंकरांच्या जटांमधून वाहणारी गंगा केवळ पौराणिक नदी नाही, तर साक्षात चैतन्याचा, करुणेचा आणि पवित्रतेचा अखंड प्रवाह आहे. संहारक मानला जाणारा शिवच जीवन टिकवून ठेवतो—ही विसंगती नसून हे पूर्णत्व आहे.

कर्पूरगौर शिव : अहंकारशून्य तेज

धृवपदातील “कर्पूरगौरा” या शब्दातून शिव अत्यंत गोरे असल्याचं सांगितलं आहे. कापूर जसा जळून पूर्णपणे नाहीसा होतो, तसा शिव अहंकारशून्य आहे. भोळेपणा म्हणजे दुर्बलता नाही, तर निर्मळ भावावर प्रसन्न होणारी सहज दैवी वृत्ती आहे. विशाल नेत्र म्हणजे सर्वांना सामावून घेणारं अपरंपार वात्सल्य, कारुण्य.

अर्धनारीनटेश्वर : अद्वैताचा कळस

“अर्धांगीं पार्वती”

या ओळीत अर्धनारीनटेश्वर तत्त्व प्रकट होतं. शिव आणि शक्ती वेगळे नाहीत — चेतना आणि क्रिया, पुरुष आणि प्रकृती यांचं द्वैत इथं विरघळतं. त्यामुळे शिवतत्त्व हे केवळ वैराग्याचं प्रतीक न राहता, संतुलित, समन्वयी आणि समग्र जीवनदृष्टीचं प्रतीक ठरतं.

भस्म : वैराग्याची जागृती

“विभुतीचें उधळण शितिकंठ नीळा”

विभूती म्हणजे भस्म. शिव सर्वांगावर चिताभस्म धारण करतात. भक्त शिवावर चिताभस्माची उधळण करतात. भस्म ही मृत्यूची आठवण आहे; पण निराशेची नाही—ती वैराग्याची जागृती आहे.

समुद्रमंथनाच्या कथेत अमृताआधी विष येतं. हा निव्वळ पौराणिक तपशील नसून मानवी जीवनाचा शाश्वत नियम आहे. साधना असो वा संसार—संघर्षाविना अमृत मिळत नाही. शिव विष पितात, पण ते गिळून टाकत नाहीत—हेच शिवतत्त्वाचं जीवनसूत्र आहे.

योगी शिव

आरतीच्या अखेरच्या कडव्यात शिव योगी रूपात प्रकट होतात—

“व्याघ्रांबर, फणिवरधर, सुंदर मदनारी”

भय, काळ आणि वासना यांवर विजय मिळवलेला शिव इंथ योगी आहे.

_“पंचानन मनमोहन मुनिजनसुखकारी”

शिव पंचमुखी आहेत. ईशान, तत्पुरुष, अघोर, वामदेव, सद्योजात—किंवा पंचमहाभूते, पंचज्ञानेंद्रिये आणि सृष्टीची पाच कार्यं यांची प्रतीकात्मक अभिव्यक्ती म्हणजे पंचानन शिव.

“शतकोटीचें बीज वाचे उच्चारी”

ॐ या एकाक्षरी प्रणवात संपूर्ण सृष्टी सामावलेली आहे. स्वयं शिव या नादात सदा मग्न आहेत.

राम–शिव अद्वैत

“रामदासा अंतरीं”

या उल्लेखातून समर्थ स्वतःला रामभक्त म्हणवतात. ते म्हणतात की, रघुकुलातील सर्वश्रेष्ठ पुरुष श्रीराम माझ्या हृदयी विराजमान आहे. रामाच्या अंतःकरणात शिव वास करतो; म्हणजेच रामदासाच्याही अंतःकरणात शिवच वास करतो. राम आणि शंकर वेगळे राहत नाहीत—इथं भक्तीतलं अद्वैत अतिशय सूक्ष्मपणे समर्थांनी उलगडलंय.

काव्यमीमांसा

या तात्त्विक गहनतेला न्याय देणारं समर्थांचं काव्यप्रभुत्व तितकंच विलक्षण आहे. विषयाला साजेसं ठेकेदार, गंभीर वृत्त, ओघवती लय आणि अर्थघन शब्दयोजना यांमुळे आरती उच्चारताना ती केवळ ऐकू येत नाही, तर अनुभवली जाते.

‘लवथव’, ‘विक्राळ’, ‘ब्रह्मांडमाळा’, ‘मदनारी’, ‘फणिवरधर’ हे शब्द अलंकार म्हणून नाही, तर तत्त्वसूचक चिन्हं म्हणून येतात. प्रथम कडव्यातील ‘ल’ आणि ‘ळ’ वर्णांचा अनुप्रास श्रुतिमधुर वाटतो.

*विरोधाभासातून परिणाम साधणारी कलाकृती*— विक्राळ पण लावण्यसुंदर, संहारक पण करुणाकर — असं शिवरूप भक्ताच्या मनात खोलवर स्थिरावतं.

समारोप

अशा प्रकारे _“लवथवती विक्राळा”_ ही आरती शिवाची स्तुती न राहता शिव होण्याची दिशा दाखवणारं तत्त्वकाव्य ठरतं. म्हणूनच ती शतकानुशतकं टिकून आहे. ती देवाला माणसाजवळ आणत नाही; उलट माणसाला अधिक विशाल, अधिक सजग आणि अधिक शिवमय बनवते. हेच या आरतीचं खरं यश आहे.

॥ ॐ शिव शंकराय नमः ॥

॥ समर्थकृत शंकराची आरती ॥

लवथवती विक्राळा ब्रह्मांडी माळा ।

वीषें कंठ काळा त्रिनेत्रीं ज्वाळा ॥

लावण्यसुंदर मस्तकीं बाळा ।

तेथुनियां जल निर्मळ वाहे झुळझूळां ॥ १ ॥

*

जय देव जय देव जय श्रीशंकरा ।

आरती ओवाळूं तुज कर्पूरगौरा ॥ ध्रु० ॥

*

कर्पूरगौरा भोळा नयनीं विशाळा ।

अर्धांगीं पार्वती सुमनांच्या माळा ॥

विभुतीचें उधळण शितिकंठ नीळा ।

ऐसा शंकर शोभे उमावेल्हाळा ॥ जय देव० ॥ २ ॥

*

देवीं दैत्यीं सागरमंथन पै केलें ।

त्यामाजीं अवचित हळाहळ जें उठिलें ॥

तें त्वां असूरपणें प्राशन केलें ।

नीळकंठ नाम प्रसिद्ध झालें ॥ जय देव० ॥ ३ ॥

*

व्याघ्रांबर फणिवरधर सुंदर मदनारी ।

पंचानन मनमोहन मुनिजनसुखकारी ॥

शतकोटीचें बीज वाचे उच्चारी ।

रघुकुळटिळक रामदासा अंतरीं ॥ जय देव जय देव० ॥ ४ ॥

 llजय जय रघुवीर समर्थ ll

© श्री  दिवाकर बुरसे

पुणे

संपर्कः ९२८४३००१२५, ९५५२६२९२४५

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ “व्हॅलेंटाईन डे – –” ☆ श्री सुधीर करंदीकर ☆

श्री सुधीर करंदीकर

? इंद्रधनुष्य ?

☆ “व्हॅलेंटाईन डे – –” ☆ श्री सुधीर करंदीकर

१४ फेब्रुवारी म्हणजे व्हॅलेंटाईन डे’ हे एक समीकरणच झालं आहे. सगळ्यांना हॅपी व्हॅलेंटाईन डे.

 काही वर्षांपूर्वी हा शब्द पण आपल्याला माहीत नव्हता आणि आता तरुणाईकरता, तो अगदी महत्वाचा सण किंवा उत्सुकतेने वाट बघण्याचा दिवस झाला आहे. काही जण असा पण विचार मांडतात, की, हा परदेशी सण आहे. आपण का म्हणून साजरा करायचा?

 आता हा सण किंवा दिवस, आपण साजरा करावा, की, नाही, याकरता हे माहिती करणे जरुरी आहे, की, व्हॅलेंटाईन चा काय अर्थ आहे, आणि व्हॅलेंटाईन डे म्हणजे काय?

 व्हॅलेंटाईन डे या उत्सवाचं मूळ ठिकाण, म्हणजे जन्म स्थान आहे, इटली मधले रोम. व्हॅलेंटाईन हे माणसाचे नाव आहे, हे रोम मध्ये राहणारे एक पाद्री (प्रिस्ट) होते. त्यावेळेस तिथे क्लोडियस या सम्राटाचे राज्य होते. त्याला आपले साम्राज्य खूप वाढवायचे होते. त्याची अशी समज होती, की, सैन्यामधल्या लोकांनी जर लग्न केलं, तर ते मन लावून लढू शकत नाहीत. म्हणून सम्राटानी असा हुकूम काढला, की, सैनिकांना लग्न करण्याची परवानगी नाही. व्हॅलेंटाईन आणि कुणालाच हे पसंत नव्हते. पण – आलीया भोगासी. लोक लपून छपून व्हॅलेंटाईनच्या मदतीने लग्न करायला लागले. राजापासून अशी गोष्ट किती दिवस लपून राहणार! राजाला हे समजताच, व्हॅलेंटाईनला फाशीची शिक्षा सुनावण्यात आली आणि व्हॅलेंटाईनची रवानगी तुरुंगात झाली.

. रोम च्या लोकांचा असा समज आणि अनुभव होता, की, व्हॅलेंटाईनकडे दिव्य शक्ती आहे आणि त्यामुळे तो कुठलेही व्यंग / आजार दूर करू शकतो. तुरुंगाच्या जेलरची मुलगी जन्मापासून अंध होती. जेलरच्या विनंतीवरून व्हॅलेंटाईन नी आपल्या दिव्य शक्तींनी त्या मुलीला दृष्टी मिळवून दिली. मुलगी रोज व्हॅलेंटाईन ला भेटायला तुरुंगामध्ये यायला लागली, आणि दोघांमध्ये मैत्रीभाव निर्माण झाला आणि त्याचे पुढे प्रेमात रूपांतर झाले. फाशीचा दिवस उजाडला.

 व्हॅलेंटाईन नी जेलर कडून कागद आणि पेन मागून घेतला, आणि त्याच्या मुलीला चिठ्ठी लिहिली आणि खाली लिहिले – “तुझा व्हॅलेंटाईन”.

हा दिवस होता १४ फेब्रुवारी ४९६.

 तेव्हापासून व्हॅलेंटाईन आणि त्या मुलीच्या प्रेमाची स्मृती म्हणून, जगभरातले प्रेमी – प्रेमिका हा दिवस वैलेंटाइन डे म्हणून साजरा करायला लागले. आपले प्रेम व्यक्त करण्याकरता फुलं, भेटवस्तू, ग्रीटिंग कार्ड आणि चॉकलेट एकमेकांना देण्याची प्रथा पण सुरु झाली. हळूहळू याची व्याप्ती वाढत गेली आणि नवरा- बायको, मित्र – मैत्रिणी, नातेवाईक, पाळीव प्राणी, असे सगळेच या परिघात आले. ज्याच्या विषयी आपल्या मनात प्रेमभावना आहे, त्यांना जगभरातले लोक, या दिवशी शुभेच्छा देतात आणि हा सण साजरा करतात.

. दोन तीन दशकांपूर्वी आपल्याकडे जागतिकीकरणाचे (ग्लोबलायझेशन) चे वातावरण तयार झाले आणि देश विदेशातील इतर गोष्टींबरोबर संस्कृतीची पण देवाणघेवाण सुरु झाली. आधी मंद गतीने सुरु झाली आणि आतातर झपाट्याने सुरु आहे. ‘व्हॅलेंटाईन डे’ हा याचाच भाग आहे, असे म्हणता येईल.

 आपल्या देशाला सणांचा देश असे म्हटल्या जाते. इथल्या इतके सण इतर कुठेही साजरे होत नाहीत. दीवाळी, राखी, होळी, पोळा, ईद, ख्रिसमस, असे अनेक सण, उत्सव आपण आनंदानी, उत्साहानी आणि एकोप्याने साजरे करतो. आमचा – तुमचा असा भेदभाव, आपण भारतीय कधीच करत नाही.

 सगळ्या सणांमागची कल्पना एकच असते, आणि ती म्हणजे, आपले प्रेम व्यक्त करणे. मग नवरा – बायको करता असो, प्रियकर – प्रेयसी करता असो, नातेसंबंधांकरता असो, मित्र परिवाराकरता असो, , प्राणिमात्रांकरता असो, किंवा निसर्गा करता असो. मनापासून कुणावरही प्रेम व्यक्त केलं, तर आपलं मन प्रसन्न होतं, आनंदी होतं.

 पण आजच्या धकाधकीच्या जीवनात, आजच्या पळापळीच्या जीवनात, आपण सर्व जण, मनानी आणि शरीराने सारखे पळत आहोत. त्यामुळे वेळ आपल्या हातातून कायम निसटून जात आहे. आता आपल्याकडे म्हणजे कुणाकडे वेळच नाही, त्यामुळे कुणावरही मनापासून प्रेम तरी कधी करणार! जीवनात प्रेम नाही, म्हणून आनंद नाही, आणि आनंद नाही म्हणून उत्साह नाही. या दुष्ट चक्रात आपण सगळेच अडकलो आहोत. भविष्यकाळात हे सगळे असे घडणार आहे, हे ओळखून, आपल्या पूर्वजांनी निरनिराळ्या सणांची मुहूर्तमेढ रचली असावी. हेतू हाच, की, थोड्या थोड्या दिवसांनी असे सण येत जातील आणि त्या त्या दिवशी सगळे आनंदात राहतील. कुठलाही सण आला, की, आपण आधीपासून प्लॅनिंग करतो, वेळ काढतो आणि आपले प्रेम व्यक्त करत, सण आणि तो दिवस आनंदानी साजरा करतो.

 असं म्हणतात – Love and happiness go hand in hand. The happiness you feel is in direct proportion with the love you give.

 कुणाही बरोबर आपलं प्रेम व्यक्त करण्याकरता काळ / वेळ / आपली प्रथा / परदेशी प्रथा, यांचं बंधन असण्याचं खरंतर काहीच कारण नाही. कारण – 

True love knows no reason 

आणि

Love has no boundaries.

 सगळ्यांविषयी आपलं प्रेम व्यक्त करायला, आजचा व्हॅलेंटाईन डे हा पण एक छान दिवस आहे.

 पूर्वी सगळे नोकरदार एक तारखेला खुश असायचे – 

 “खूष है जमाना, आज पहिली तारीख है”.

 आता सगळे प्रेम व्यक्त करणारे १४ फेब्रुवारीला खुश असतात – “खूष है जमाना, आज व्हॅलेंटाईन डे है”.

 

© श्री सुधीर करंदीकर

मो. 9225631100 – ईमेल – srkarandikar@gmail. com

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ मनाचे श्लोक – एक सार्वकालिक ‘मनोपनिषद’… – भाग – २ ☆ श्री विश्वास देशपांडे ☆

श्री विश्वास देशपांडे

? इंद्रधनुष्य ?

☆ मनाचे श्लोक – एक सार्वकालिक ‘मनोपनिषद’… – भाग – २ ☆ श्री विश्वास देशपांडे ☆

मनाचे श्लोक समर्थ रामदासांनी कसे आणि कोणत्या परिस्थितीत लिहिले त्याची कथा मोठी रंजक आहे. समर्थांनी चाफळला श्रीराम नवमीचा उत्सव सुरू केला होता. या उत्सवा दरम्यान परिसरातील आणि आजूबाजूच्या गावातील शेकडो लोक दर्शनासाठी आणि प्रसादासाठी त्या ठिकाणी एकत्र येत होते. छत्रपती शिवाजी महाराजांना या उत्सवाबद्दल जेव्हा कळले तेव्हा त्यांनी दरवर्षी या उत्सवाला मदत देण्याचे ठरवले. दरवर्षी महाराजाकडून या उत्सवासाठी धान्य, शिधा, पैसे इ. स्वरूपात नियमितपणे मदत येत होती. परंतु एकदा मात्र काही कारणाने ही मदत पोहोचू शकली नाही. कदाचित महाराज मोहिमेत गुंतले असल्यामुळे असे झाले असावे. परंतु हा उत्सव कसा पार पडेल याची शिष्यांना मात्र चिंता लागली होती. त्यांनी समर्थांच्या कानावर हा विषय घातला. समर्थ म्हणाले, ” कर्ता करविता राम आहे. हा त्याचाच उत्सव आहे. तोच आपल्याकडून हे कार्य करून घेईल. “

त्याच दिवशी रात्री समर्थांनी रात्री आपला पट्ट शिष्य कल्याणस्वामी यांना बोलावले आणि त्यांना येताना लेखनसामग्री घेऊन येण्यास सांगितले. समर्थांनी कल्याणाला आपल्यासमोर बसवले आणि त्यांच्या मुखातून मनाचे श्लोक बाहेर पडू लागले. ‘ गणाधीश जो ईश सर्वा गुणांचा ‘ या नमनाच्या श्लोकाने सुरुवात झाली. समर्थ सांगत होते आणि कल्याण लिहून घेत होता. हा घटनाक्रम रात्रभर सुरू होता. ‘ अंतरीचे धावे स्वभावे बाहेरी ‘अशातलेच हे होते. लोक कल्याणाच्या तळमळीतून समर्थांच्या चिंतनातूनच उत्स्फूर्ततेने हे श्लोक त्यांच्या मुखातून बाहेर पडले होते.पहाट होईपर्यंत समर्थांनी २०५ श्लोक कल्याणाला सांगितले आणि त्याने ते लिहून घेतले. नंतर समर्थ तपश्चर्येसाठी घळीमध्ये निघून गेले अशी मनाच्या श्लोकांच्या निर्मितीची कथा सांगितली जाते.

सकाळी कल्याण स्वामींनी समर्थांच्या सर्व शिष्यांना एकत्र करून हे मनाचे श्लोक सांगितले आणि त्यांच्याकडून मनाच्या श्लोकाच्या प्रती तयार करून घेतल्या. या प्रती प्रत्येक शिष्याकडे देऊन त्यांना घरोघरी भिक्षा मागण्यासाठी पाठवण्यात आले. प्रत्येकाने त्यातील एक श्लोक खड्या आवाजात म्हणून त्यानंतर जय जय रघुवीर समर्थ असे म्हणायचे असे सांगितले गेले. सर्व शिष्यांनी पंचक्रोशीत जाऊन भिक्षा मागितली आणि काय आश्चर्य ! गाड्या भरभरून धान्य गोळा झाले आणि रामनवमीचा उत्सव मोठ्या थाटामाटात साजरा झाला. समर्थ शिष्यांची भिक्षेची ही परंपरा आजही सुरू आहे.

समर्थांनी केवळ वनात राहून तपश्चर्या केली नाही तर समर्थ जनात आणि वनात अशा दोन्ही ठिकाणी राहिले ते स्वतः घरोघर हिंडून भिक्षा मागत असत. समाजाशी संपर्क यावा समाजाची परिस्थिती कळावी आणि विविध स्तरातील लोकांची संबंध यावा यासाठी ही भिक्षेची पद्धत त्यांच्या कार्यात फार उपयुक्त ठरली. यादृष्टीने समर्थांनी जे मनाचे श्लोक लिहिले ते फार उपयुक्त ठरले. त्यांच्या कार्यकर्त्यांना समाजाशी संपर्क साधणे, समाजाच्या स्थितीची माहिती घेणे हे त्यामुळे सोपे झाले. समर्थांनी अंगीकारलेल्या कार्यात या गोष्टीची मदत झाली. आपल्या कार्यात त्यांनी अशा रीतीने समाजाला जोडून घेतले. तसेच भिक्षेच्या पद्धतीमुळे कोणावर ओझे बनून राहण्याची परिस्थिती आली नाही. कोणावर भिक्षा द्या म्हणून सक्ती नव्हती त्याचप्रमाणे कोणाचीही उपासमार झाली नाही. त्यांच्यापैकी कोणीही या पद्धतीमुळे समाजाशी फटकून वागले नाही आणि समाजाला देखील त्यांच्याबद्दल एक प्रकारची आत्मीयता आणि आदर निर्माण झाला. यासारख्या गोष्टी अगदी सहजतेने घडत होत्या म्हणूनच मनाचे श्लोक फार उपयुक्त ठरले. त्या काळात सर्वत्र मुस्लिम राजवट होती. लोकांच्या मनावर गुलामगिरीचा पगडा होता. स्वधर्माविषयीचा आदर आणि अभिमान नाहीसा होत चालला होता. अशा परिस्थितीत त्यांच्या या श्लोकाने जनसामान्यांना मार्गदर्शन केले आणि एक प्रकारे समाजात जागृती घडवून आणली.

या मनाच्या श्लोकांमध्ये विवेक, वैराग्य आणि भक्ती ही समर्थांनी सांगितलेली त्रिसूत्री मुख्य आधार आहे. विवेक म्हणजे काय स्वीकारावे आणि काय सोडावे याचे भान. वैराग्य याचा अर्थ अनावश्यक इच्छांपासून मनाला मुक्त करणे. आणि भक्ती म्हणजे एका उच्च ध्येयाशी (राघवाशी) मनाला जोडून घेणे. त्या मार्गावर वाटचाल करणे.

” केल्याने होत आहे रे आधी केलेची पाहिजे ” ही समर्थांची शिकवण आहे. ती त्यांच्या अनुभवातन किंवा प्रचितीतून आलेली आहे. साधारण साडेतीनशे वर्षांपूर्वी लिहिलेले हे श्लोक आजही मनाला मार्गदर्शन करण्यासाठी मोलाचे ठरतात. आजच्या तणावग्रस्त परिस्थितीत गीतेप्रमाणेच आपल्याला ते कसे वागावे आणि बंधापासून तर मुक्तीपर्यंत कशाप्रकारे वाटचाल करावी हे अत्यंत सुलभ पद्धतीने सांगतात.

हे सर्व लिहिण्यामागे एकच शुद्ध हेतू आहे – समर्थांनी दिलेला हा ‘बोध’ केवळ पाठांतरापुरता मर्यादित न राहता तो आपल्या ‘ वर्तनाचा ‘ भाग व्हावा. मनाचे श्लोक हे केवळ ओठांवर न राहता आपल्या अंतर्यामी उतरावे.

मनाचे श्लोक २०५ आहेत. काही ठिकाणी त्यांची संख्या २१० अशीही दिली आहे. परंतु २०५ श्लोक हे सर्वमान्य आहेत. प्रत्येक धार्मिक ग्रंथाच्या शेवटी त्याची फलश्रुती दिलेली असते किंवा तो ग्रंथ का वाचायचा हे सांगितलेले असते. तशाच प्रकारची फलश्रुती समर्थ रामदासांनी मनाच्या श्लोकांचा समारोप करताना सांगितली आहे. ते म्हणतात

मनाची शते शते ऐकता दोष जाती

मतीमंद ते साधना योग्य होती

चढे ज्ञान वैराग्य सामर्थ्य अंगी

म्हणे दास विश्वासता मुक्ती भोगी.

ही मनाची शते ( म्हणजे शतक अर्थात द्विशतक आणि येथे २०५ श्लोक असा अर्थ घ्यावा ) ऐकल्यानंतर दोष निघून जातात. मतिमंद लोक देखील साधन करण्यासाठी पात्र होतात, ज्ञानवैराग्य संपन्न होतात आणि मुक्तीच्या सुखाप्रत पोहोचतात. ही मनाच्या श्लोकांची फलश्रुती होती आहे. भगवद्गीता जशी कोणा एका विशिष्ट धर्मासाठी नाही तर ती सर्व मानवजातीसाठी आहे. तसेच मनाचे श्लोक देखील सर्व मानवजातीला मार्गदर्शन करणारे आहेत. गोविंद देव गिरी महाराज म्हणतात,” मनाचे श्लोक वाचल्यानंतर आणि ते जीवनात उतरवल्यानंतर तुम्हाला चार वेद किंवा भगवद्गीता किंवा महाभारत वाचण्याची आवश्यकता नाही यामध्ये त्यातील सर्व सार आले आहे.” मनाचे श्लोक म्हणजे तृषार्ताची तहान भागवणारे मधुर जलाचे सरोवर. आपली जेवढी तहान असेल तेवढे पाणी आपण प्राशन करावे आणि आपली तृषा भागवावी.

मनाच्या श्लोकांचे विश्लेषण करताना आपण केवळ शब्दांचे अर्थ पाहणार नाही, तर त्या श्लोकामागील समर्थांचा मानसशास्त्रीय दृष्टिकोन आणि आधुनिक काळातील त्याचे महत्त्व पाहणार आहोत.

समर्थ जेव्हा ‘मना सज्जना’ म्हणतात, तेव्हा ते आपल्याला आपल्यातील सुप्त देवत्वाची जाणीव करून देतात. हा प्रवास आहे – स्वैर मनाकडून स्थिर मनाकडे, आणि स्थिर मनाकडून ईश्वरी साक्षात्काराकडे. या मनोपनिषदाच्या माध्यमातून आपण मनाच्या एका अशा प्रदेशात प्रवेश करणार आहोत, जिथे गोंधळ संपतो आणि स्पष्टता (Clarity) सुरू होते.” या मार्गावर वाटचाल करण्याची शक्ती श्रीराम आम्हाला देवो अशी प्रार्थना करून पुढील भागापासून प्रत्यक्ष श्लोकांचा अर्थ समजावून घेऊया. 

– क्रमशः भाग दुसरा  

© श्री विश्वास देशपांडे

चाळीसगाव

प्रतिक्रियेसाठी ९४०३७४९९३२

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ ।। श्री नारद उवाच ।। – नारद भक्ति सूत्रे —सूत्र ४३ आणि ४४ ☆ श्री संदीप रामचंद्र सुंकले ☆

श्री संदीप रामचंद्र सुंकले

? इंद्रधनुष्य ?

।। श्री नारद उवाच ।। – नारद भक्ति सूत्रे — सूत्र ४३ आणि ४४ ☆ श्री संदीप रामचंद्र सुंकले 

।। श्री नारद उवाच ।। 

नारद भक्तिसूत्रे ४३

दुःसंगः सर्वथैव त्याज्यः ॥ ४३ ॥

अर्थ : दुष्ट संग हा सर्व प्रकारे (अंतर्बाह्य) टाकला पाहिजे.

विवेचन:- संतांची संगत करताना काही पथ्ये ही पाळली पाहिजेत. काही गोष्टींचा संग प्रयत्नपूर्वक टाळला पाहिजे. पुढील तीन सूत्रात नारद महाराज आपल्याला कोणत्या गोष्टींचा त्याग करायचा हे सांगत आहेत.

मनुष्य हा समाजप्रिय प्राणी आहे हे सर्वमान्य आहे. त्यामुळे तो एकटा राहूच शकत नाही. त्याला सतत कोणीतरी सोबतीला, संगतीला हवे असते. प्रत्येकाच्या आयुष्यात नेहमीच चांगली माणसे येतील असे होत नाही. जशी भेटतील ती माणसे स्वीकारून मनुष्याला जीवन जगावे लागते. त्यामुळे रोजच्या जीवनात त्याला बरेवाईट अनुभव येत असतात. साधक पक्का होत नाही तोपर्यंत याचा त्याला कमीअधिक प्रमाणात त्रास होत असतो. संत तुकाराम महाराज एका अभंगात आपल्याला सांगतात,

*”मान अपमान गोवे । अवघे गुंडूनी ठेवावे ॥१॥हेंचि देवाचें दर्शन । सदा राहे समाधान ॥२॥शांतीची वसती । तेथें खुंटे काळगती ॥३॥आली ऊर्मी साहे । तुका म्हणे||४||”*

.. (अभंग क्रमांक ८४, सार्थ तुकाराम गाथा धार्मिक प्रकाशन संस्था)

संसारातही संग असतोच व परमार्थातही सत्संग आवश्यक आहेच हे मागील सूत्रांतून स्पष्ट झालेच आहे. पण ती सत्संगती प्राप्त होण्याला प्रतिकूल अशी दुःसंगती असते. अनादि संसारात नित्य विषयसेवनाचेच संस्कार साचलेले असतात. इंद्रिय-तादात्म्य, विकार हे त्या दुःसंगाचे प्रेरक असतात. जोपर्यंत त्या दुःसंगात साधक असतो तोपर्यंत त्याची सत्संगाकडे प्रवृत्ती होत नाही. कदाचित झाली तरी तिचा उपयोग होऊ शकत नाही. म्हणून प्रथम त्या दुःसंगाचा त्याग करावयास नारद सांगतात. कित्येक वेळी दुःसंगाचे काही अनिष्ट परिणाम भोगावयास मिळाले असता काही दुःसंग टाकले जातात असे दिसून येते. पण तो खरा त्याग नव्हे. एका प्रकारचा टाकला तर अन्य प्रकारचा राहतोच. कारण दुःसंग एकच प्रकारचा नसतो. म्हणून सूत्रात ‘सर्वथैव’ असे महत्त्वाचे पद घातले आहे. संगाचा चांगलेपणा व वाईटणा त्या संगाच्या विषयावर अवलंबून असतो. दुःसंग हा बाह्य व आंतर असा दोन प्रकारचा आहे. निषिद्ध शब्द स्पर्शादि पंचविषय हे बाह्य असतात, पण ते तमोगुण कार्य म्हणून मोहशक्तीने युक्त असतात. अनादिकालीन विषय इंद्रियतादात्म्यामुळे विषयाचे ठिकाणी अनुकूल बुद्धी निर्माण होते. अंतःकरण राग व द्वेषयुक्त असते, त्यामुळे ते सहज विषयाकडे प्रवृत्त होते. पण ते परिणामी किती बाधक असतात याचे विवेचन मागे सूत्र पस्तीसमध्ये आलेच आहे. सर्व संतांनी पर धन, परस्त्रीचा त्याग करायला सांगितले आहे. परस्त्री माते समान मानावी असे सांगितले आहे.

साधकांस स्त्रीसंगया बाधक होतो याचे अनेक दाखले देता येतील. मोठे तपस्वीही या संगात अडकून पडले असल्याचे आपल्या लक्ष्यात येईल.

दैनंदिन व्यवहार करताना मनुष्य त्याच्या इंद्रिद्वारे करीत असतों. ज्याला भगवतांची प्राप्ती करून घ्यायची आहे, त्याने सर्व इंद्रिये, मन, देह निव्वळ शुद्ध करुन चालणार नाही, तर पवित्र करणे तितकेच आवश्यक आहे. संत तुकाराम महाराज प्रापंचिक लोकांसाठी विशेष आदर्शवत असे आहेत. साधनेच्या प्रत्येक टप्प्यातील स्थितीवर त्यांनी मार्मिक अभंग लिहिले आहेत. एका अभंगात ते म्हणतात,

*”पापाची वासना नको दावू डोळा । त्याहुनि अंधळा बराच मी ॥१॥ निंदेचे श्रवण नको माझे कानी । बधिर करोनि ठेवी देवा ॥२॥ अपवित्र वाणी नको माझ्या मुखा ।त्याजहुनि मुका बराच मी ॥३॥ नको मज कधी परस्त्रीसंगति । जनातुन माती उठता भली ॥४॥ तुका म्हणे मज अवघ्याचा कंटाळा । तू एक गोपाळा आवडसी ॥५॥”*

 – संत तुकाराम

‘मनुष्य संतांच्या संगतीत राहील तर तो तसाच बनतो. असंताच्या संगाने असंत, तपस्व्याच्या संगतीत तपस्वी व चोराच्या संगतीत चोर बनतो, वस्त्राला जो रंग द्यावा तो चढतो तसेच माणसाचे आहे. ‘ म्हणून बुद्धिमान पुरुषाने दुष्टांची संगती टाकून देऊन संतांची संगती धरावी. संत हे आपल्या संगतीत असणार्‍याच्या मनातील विषयासक्तीचा आपल्या अमृतमय वाणीने नाश करतात.’

अशा रीतीने दुःसंग सर्वथा त्यागावा हे सांगितले. पण त्याचा त्याग का करावा? तर तो सर्वथा जीवाचा सर्वनाश करणारा आहे. तो कशा कशा प्रकारे मानवाचा सर्वनाश करण्यास कारण होतो हे सांगण्याकरिता पुढील सूत्राची रचना केली आहे.

जय जय रघुवीर समर्थ || 

नारद भक्तिसूत्रे ४४

कामक्रोधमोहस्मृतिभ्रंशबुद्धिनाशसर्वनाशकारणत्वात् ॥४४॥

अर्थ : दु:संग हा भोगवासना, राग आणि मोह निर्माण करून स्मृतिनाश करतो, तसेच विवेक नष्ट करून मनुष्याच्या सर्वनाशास कारणीभूत होतो.

म्हणून साधकाने दु:संग प्रयत्नपूर्वक टाळावा.

विवरण : मागील सूत्रात दुःसंग हा सर्व प्रकारे त्याज्य आहे व तो दुःसंग अंतर व बाह्य असा दोन प्रकारचा आहे असे म्हटले होते. मनुष्याच्या मनात येणारे वाईट विचार आणि त्याच्या हातून घडणारी कृति, या दोन्हीचा परिमाण मनुष्यावर होत असतो.

संग करणे म्हणजे त्या गोष्टीच्या सहवासात रहाणे. कामक्रोधादी सहा विकार मनुष्याला त्याच्या मूळ ध्येयापासून दूर नेत असतात. म्हणून त्यांच्या त्याग करावा असे आपल्याकडे सांगितले जाते. श्री. गोंदवलेकर महाराज इथे व्यावहारिक बाजू लक्षात घेऊन हाच विषय थोड्या वेगळ्या पद्धतीने मांडतात. ते म्हणतात, की विकार भगवंताने निर्माण केले आहेत, त्यामुळे त्यांना आपल्या दैनंदिन व्यवहारात निश्चित असे स्थान असले पाहिजे. स्वयंपाक करताना नुसते तिखट वापरले, किंवा नुसती हळद वापरली तर स्वयंपाक स्वादिष्ट होण्याची शक्यता अगदीच कमी. स्वयंपाक स्वादिष्ट होण्यासाठी हळद, तिखट आणि इतर जिन्नस योग्य त्या प्रमाणात त्यात घातले पाहिजेत. हेचं सूत्र आपल्याला आपल्या दैनंदिन जीवनात उपयोगी पडते. ह्या सहा विकारांचा विवेकाने विनियोग करता आला तर मनुष्य, साधक त्यांच्या सहाय्याने प्रगती करू शकतो. उदा. आपल्याला राग येतो, याचा मनुष्याला राग आला पाहिजे. साधना करण्याचा कंटाळा न येता, साधना करताना येणाऱ्या कंटाळ्याचा कंटाळा मनुष्याला आला पाहिजे… , पटतंय ना?

अनेक संत स्त्रीसंग करू नये असे म्हणतात. यातील मर्म नीट समजून घेतले गेले नाही तर संभ्रम होऊ शकतो. एकटी स्त्री अथवा स्त्रिया काहीही करू शकत नाहीत. पण स्त्रीकडे पाहण्याचा दृष्टिकोन मातृत्वाचा नसेल तर मात्र गोष्टी बिघडू शकतात, असे सर्व संताना सुचवायचे असावे.

कित्येकाना असे वाटते की, ईश्वरच सर्व कर्माचा प्रेरक असल्याने ईश्वरप्रेरणेनेच पाप होते. कित्येकाची अविवेकमूलक भावना अशी असते की अदृष्टाने पाप होते. ईश्वर जर पापप्रेरक होईल तर त्याचेवर विषमता व क्रूरता हे दोष येतील. ज्या ईश्वराच्या कृपेने जीव उद्धरून जातो तो ईश्वर जीवास पाप करावयास कसे लावील? तसेच अदृष्टही पापास प्रेरक नाही. अदृष्ट हे भोगाला नियामक आहे. सुखदुःखादि भोग अदृष्टजन्य असतात.

कर्म करण्यात जीव स्वतंत्र आहे. ‘स्वतंत्र कर्ता’ असे पाणिनीचे सूत्र आहे. शुभसंस्काराने सद्‌बुद्धीचा जीव अंगीकार करतो तेव्हा त्याच्याकडून पुण्यकर्म होते व अशुभ संस्कार, दुर्बुद्धी व विकाराच्या स्वाधीन झालेला मानव पापकर्मात प्रवृत्त होतो म्हणून श्रीकृष्ण अर्जुनास सांगतात,

*”काम हा आणि क्रोध हा घडीला जो रजोगुणे |*

*मोठा खाादाड पापिष्ट तो वैरी जाण तूं इथे ||”*

(गीताई. ३. ३७)

काम-क्रोधाच्या आधीन झालेल्या माणसास जरी काही पूर्वसंस्कार परमार्थाचे असले तरी मोहाने ते झाकले जातात हा मोहाचा प्रभाव आहे. या स्मृतिभ्रंशाच्या पुढची पायरी ‘बुद्धिनाश’ ही आहे. बुद्धिनाश म्हणजे दुसर्‍या अध्यायात गीतेमध्ये जी सद्‌बुद्धी म्हणून सांगितली आहे किंवा गीतेच्या अठराव्या अध्यायात तीन प्रकारची सात्त्विक, राजस, तामस, अशी बुद्धी सांगितली आहे त्यात ‘प्रवृत्ती-निवृत्ती, कार्य-अकार्य, भय-अभय, बंध-मोक्ष यांना यथार्थ रूपाने जी जाणते ती सात्त्विक बुद्धी होय. ‘ असे श्रीकृष्णानी अर्जुनास सांगितले आहे. अशी आपल्या हिताला जी बुद्धी जाणत नाही तोच तिचा नाश होय. कारण वर सांगितलेली बुद्धी हीच मानवाना उद्धारास अनुकूल आहे, हिलाच सद्‍बुद्धी असे म्हणतात. अशा या बुद्धीचा नाश झाला म्हणजे पुढची पायरी सर्वनाशाचीच आहे असे नारद म्हणतात.

‘अंतःकरणात विषयांची नुसती आठवण असेल तरीही संग टाकलेल्यासही पुन्हा विषयासक्ती येऊन चिकटते व त्यामुळे विषयेच्छा प्रगट होते. जेथे काम उत्पन्न होतो तेथे क्रोधाने आपले बिर्‍हाड आधीच ठेवलेले असते, व जेथे क्रोध आला तेथे कार्याकार्याविषयी अविचार ठेवलेला आहेच. ज्याप्रमाणे सोसाट्याच्या वार्‍याने दिवा नाहीसा होतो त्याप्रमाणे संमोह प्रगट झाल्यावर स्मृती नाश पावते. किंवा सूर्य मावळायच्या वेळेला रात्र सूर्यतेजाला ज्याप्रमाणे गिळून टाकते त्याप्रमाणे स्मृतिभ्रंश झाला असता प्राण्याची दशा होते. मग सर्वत्र केवळ अज्ञानाचा अंधार होतो व त्याचेच आवरण सर्वांवर पडते, अशा वेळी हृदयात बुद्धी व्याकुळ होते. त्यामुळे जेवढे म्हणून ज्ञान आहे तेवढे समूळ नष्ट होते. प्राण निघून गेले असता शरीराची जशी दशा होते त्याप्रमाणे बुद्धीचा नाश झाला असता पुरुषाची स्थिती होते. ‘ 

श्रीनारद महाराज या दोन सूत्रातून त्याचा त्याग व बाधकता सांगून गेले. पुढील पंचेचाळीसाव्या सूत्रात आणखी एका दृष्टीने या कामक्रोधादिकांची बाधकता दृष्टान्त द्वारा पटवून देतात.

जय जय रघुवीर समर्थ || 

नारद महाराज की जय!!!

– भक्ती सूत्र क्र. ४३ आणि ४४.

© श्री संदीप रामचंद्र सुंकले (दास चैतन्य)

थळ, अलिबाग. 

८३८००१९६७६

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ “असाही एक सिक्युरिटी गार्ड…” ☆ श्री संभाजी बबन गायके ☆

श्री संभाजी बबन गायके

? इंद्रधनुष्य 

☆ “असाही एक सिक्युरिटी गार्ड…” ☆ श्री संभाजी बबन गायके

हुतात्मा सैनिकांच्या माता-पित्यांच्या पायांखालची माती कपाळाला लावणारा माणूस!

“नमश्कार, साहब… मैं सिक्युरिटी गार्ड जितेंदर सिंग राठौर! ” 

– – एखादे सैनिक, पोलिस अधिकारी, किंवा डॉक्टर्स, प्राध्यापक जशी स्वत:ची ओळख सांगतात तशी ओळख जितेंदर सिंग राठौर सांगतात तेंव्हा या माणसातलं काहीसं वेगळेपण आपल्याला जाणवल्यावाचून रहात नाही. एरव्ही मी सिक्युरीटी गार्ड आहे असं अभिमानानं कोण सांगेल? पण हा माणूसच मनातून सैनिक प्रवृत्तीचा आहे. राजस्थानमध्ये राठौर या लढवय्या घराण्यात जन्माला आलेले जितेंदर सिंग अनेक राजस्थानी तरुणांसारखे सैनिक होण्याचं स्वप्न उराशी बाळगून होते. पण दुर्दैवाने ते वर्दीधारी सैनिक बनू नाही शकले…! पण once a soldier… always a soldier… हे त्यांच्या मनाने अतिशय गांभीर्याने घेतलं. केवळ अंगावर गणवेश मिळतोय म्हणून त्यांनी सुरक्षा रक्षकाची तशी कमी पगाराची आणि कमी सन्मानाची नोकरी स्वीकारली… संपूर्ण कारकीर्दीत त्यांनी वेगवेगळ्या प्रकारचे २४ सुरक्षा रक्षक गणवेश परिधान केलेले आहेत. आणि सध्या ते सरदार वल्लभभाई पटेल संस्थेत कार्यरत आहेत.

१९९९ चे कारगिल युद्ध संपले होते. हुतात्मा सैनिकांचे देह त्यांच्या गावोगावी सन्मानाने पोहोचवले जात होते. अशाच एका हुतात्मा सैनिकाच्या पित्याचे “बेटा गया तो क्या हुआ… वतन तो सुरक्षित है… ” हे वाक्य जितेंदर सिंग यांच्या कानांवर पडले आणि त्यांच्या मनातील सैनिकाने एक मिशन हाती घेतले… सैनिकांच्या स्मृती जतन करून ठेवण्याचे!

– – आणि मग सुरु झाला एक मोठा प्रवास. या प्रवासात लोकांकडून काहीबाही ऐकून घेण्याचाही टप्पा आलाच. लष्कराच्या भाकरी भाजायच्या कशाला? यातून काय मिळणार? असेही प्रश्न ऐकावे लागले असतीलच. कारण यांनी ज्या कार्याला हात घातला होता… त्या कार्यात सातत्य, चिकाटी आणि परिश्रम आवश्यक आहेत. एकतर आपल्या देशात पूर्वी सैनिकांची माहिती एकत्रित ठेवण्याची रीत, सोय नव्हती. विविध बटालियन्स, रेजिमेंटस त्यांच्या त्यांच्या पुरते मर्यादित दस्तऐवज ठेवत असतील. शिवाय पायदळ, वायुदल, नौसेना असे तीन वेगवेगळे विभाग आहेत. त्यात बी. एस. एफ, सी. आर. पी. एफ. इत्यादी अनेक शाखा आहेत. त्यामुळे कुणा एका सैनिकाची माहिती एकाच ठिकाणी उपलब्ध असणे दुरापास्तच असेल.

– – पण सुमारे दोन लाख सैनिकांची माहिती, छायाचित्रे जमा करून ठेवण्याची किमया या केवळ दहावी उत्तीर्ण माणसाने करून दाखवली आहे. त्यांच्याकडे सुमारे तीनशे हुतात्मा सैनिकांचे छोटे पुतळेही आहेत, जे त्यांनी स्वखर्चाने तयार करवून घेतले आहेत.

हुतात्मा सैनिकांच्या कुटुंबियांना ते नियमित पत्रे लिहित असतात… आजवर त्यांनी दीड हजार पत्रं लिहून पोहोचवलीही आहेत. डोळ्यांत मोतीबिंदू झाल्यावर दृष्टी कमी झाल्यावर, आणखी दृष्टी कमी होण्यापूर्वीची खबरदारी म्हणून त्यांनी आणखी काही पत्रं लिहून तयार ठेवली आहेत. ज्यांवर फक्त पत्ता घातला की काम झाले!

सर्वांत महत्त्वाची आणि काळजाला हात घालणारी बाब म्हणजे हुतात्मा सैनिकांच्या माता-पित्यांच्या पायांखालची माती त्यांनी जमवून ठेवली आहे…! ही भावना काही साधीसुधी नाही… यासाठी खूप संवेदनशील मन असावे लागते!

पहिले महायुद्ध ते अगदी काल परवा झालेल्या हौतात्म्याची अचूक माहिती त्यांच्याकडे उपलब्ध आहे. आश्चर्य म्हणजे खुद्द काही लष्करी विभागातील लोक त्यांच्याशी विशिष्ट बाबतीत माहिती घेण्यास येत असतात. जे काम खरं तर सरकारचे, सेनेचे आहेत… ते काम एक सामान्य माणूस करतो आहे, हे विचार करण्यासारखे आहे. यातून सरकार आणि सामान्य जनता खूप काही शिकू शकते. माहिती एकत्रित करून ती जतन करून ठेवणे हा विचार केला गेला पाहिजे!

कित्येक किलो वजन भरेल एवढ्या बातम्यांची कात्रणे, छायाचित्रे त्यांच्याकडे आहेत. त्यासाठी त्यांनी स्वत:च्या पगारातून खर्च केला आहे. नातेवाईक, कुटुंबीय, समाजातील इतर लोकांनी या त्यांच्या छंदाबाबत काय काय प्रतिक्रिया व्यक्त केल्या असतील, याचा केवळ अंदाजच बांधता येईल!

सध्या गुजरात येथील सूरत शहरात नोकरीत असलेल्या या अवलिया माणसाची माहिती पंतप्रधान कार्यालयापर्यंत आणि तिथून अर्थातच पंतप्रधान महोदयांपर्यंत पोहोचली. पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी साहेबांनी त्यांच्या मासिक आकाशवाणी संबोधनात, ‘ मन की बात’ या कार्यक्रमात श्री. जितेंदर सिंग यांच्या कामाचा गौरवपूर्ण उल्लेख केला!

एके दिवशी श्री. जितेंदर सिंग एका लग्न समारंभात सुरक्षा रक्षक म्हणून काम करीत होते. त्यांना पंतप्रधान कार्यालयातून फोन आला… आपणास सव्वीस जानेवारी, दोन हजार सव्वीस रोजी दिल्लीत प्रजासत्ताक दिन समारंभास निमंत्रित केले गेले आहे! यावर या माणसाने थेट सांगितले… खिशात केवळ एकशे दोन रुपये आहेत. दिल्लीत येण्यासाठी तिकिटाला पैसे नाहीत! त्यावर पंतप्रधान कार्यालयाने श्री. जितेंदर सिंग यांची सूरत-दिल्ली-सूरत विमानाची जाण्या-येण्याची तिकिटे पाठवून दिली, सोबत त्यांच्या पत्नीचीही तिकिटे दिली, दिल्लीत उत्तम निवास, भोजन व्यवस्था करून दिली. आयुष्यात पहिल्यांदा एवढ्या सुसज्ज निवासस्थानी राहण्याचा, त्यांच्या शब्दांत सांगायचे झाल्यास… ’जिंदगी में पहली बार इतना महंगा खाना’ त्यांनी खाल्ले! आजवर मोठमोठ्या हॉटेल्सचे सुरक्षारक्षक म्हणून काम केले.. पण पहिल्यांदाच तशा हॉटेल्समध्ये राहण्याचा योग आला! एका सामान्य माणसाची एवढी छान बडदास्त ठेवणा-या पंतप्रधान कार्यालयाचे कौतुक करावेच लागेल!

‘तुम्हाला काय पाहिजे? या प्रश्नावर त्यांनी अर्थातच अशी मागणी केली आहे की… त्यांचा हा माहिती, छायाचित्र, पुतळे संग्रह एकाच ठिकाणी सुरक्षित जतन केला जाण्याची व्यवस्था व्हावी!

मी दोन वर्षांपूर्वी कै. रावत साहेबांच्या संदर्भात एक लेख मराठीत लिहिला होता. तो लेख जितेंदर सिंग यांच्यापर्यंत पोहोचला… मराठी विशेष समजत नसतानाही त्यांनी मजकूर समजावून घेतला आणि मला फोन केला… त्यांच्या कार्याची माहिती दिली!

अशा या जन-सैनिकाला आपण अभिवादन करावे, असे वाटल्याशिवाय राहवत नाही. जम्मूचे विकास मन्हास नावाचे एक गृहस्थ देशभरात हुतात्मा सैनिकांच्या कुटुंबियांच्या भेटी घेत असतात, त्यांच्याशी सातत्याने संपर्क साधून त्यांच्या सुख-दु:खात सहभागी होत असतात. मुंबईच्या उमाताई कुलकर्णी अगदी रोजच्या रोज हुतात्मा सैनिक, त्यांच्या कुटुंबियांविषयी फेसबुकवर माहिती देत असतात. असे अनेक नागरिक देशासाठी लढणा-या सैनिकांविषयी सा-या देशाच्या वतीने कृतज्ञता व्यक्त करीत असतात. जयहिंद फाउंडेशन सारख्या अनेक संस्था हुतात्मा जवानांच्या कुटुंबियांना आधार देण्याचे कार्य करीत असतात. लोकवर्गणी मधून सियाचीनमध्ये सैनिकांसाठी प्राणवायू निर्मिती संयंत्र देणा-या कै. योगेश चिथडे व आताही त्यांचे कार्य पुढे नेणा-या सुमेधा ताई चिथडे यांचेही कार्य मोठे आहे. नागरिकांनी अशा प्रकारे सैनिकांच्या मागे ठाम उभे राहिल्यास त्यांनाही लढण्याचे अधिक बळ लाभेल यात शंका नाही.

– – – देशाची ‘सिक्युरिटी’ सांभाळणा-या सैनिकांच्या स्मृतींचा ‘गार्ड’ बनून अहोरात्र उभ्या असलेल्या श्री. जितेंदर सिंग राठौर यांना सल्यूट! त्यांच्या कार्यास जनतेने जरूर हातभार लावावा. जय हिंद!

© श्री संभाजी बबन गायके 

पुणे

9881298260

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ मनाचे श्लोक – एक सार्वकालिक ‘मनोपनिषद’… – भाग – 1 ☆ श्री विश्वास देशपांडे ☆

श्री विश्वास देशपांडे

? इंद्रधनुष्य ?

☆ मनाचे श्लोक – एक सार्वकालिक ‘मनोपनिषद’… – भाग – १ ☆ श्री विश्वास देशपांडे ☆

अनेक दिवसांपासून मनाच्या श्लोकांवर काहीतरी लिहावे अशी माझी इच्छा होती. परंतु समर्थांच्या प्रचितीतून आणि अनुभवातून आलेले हे दिव्य श्लोक ! त्यावर खरोखरीच मी काही लिहू शकेन किंवा तसे लिहिण्याची माझी पात्रता आहे का हाही प्रश्न माझ्या मनात होता. तो अजूनही आहे. परंतु तरीसुद्धा मला जसे सुचेल आणि आकलन होईल तसे त्यावर लेखन करावे असा कौल माझ्या मनाने मला दिला. जसे समर्थ म्हणतात ‘ कर्ता करविता राम आहे.’ तसेच मी सुद्धा म्हणतो की हे माझ्याकडून लिहून घेणारे समर्थ आहेत त्यांच्या कृपेनेच मी काही थोडे बहुत लिहिण्याची हिंमत करतो आहे. काही चुकले तर ते मला सांभाळून घेतील आणि आपणही सुज्ञ वाचक मला सांभाळून घ्याल.

समर्थ रामदासांनी विपुल साहित्य रचना केली आहे. त्यामध्ये दासबोध, करुणाष्टके, आत्माराम, मनाचे श्लोक, एकवीस समासी, मानपंचक, मानसपूजा अनेक देवी-देवतांची स्तोत्रे आणि आरत्या असे समृद्ध साहित्य आहे. या त्यांच्या साहित्यामध्ये प्रामुख्याने अध्यात्म विषयाचे प्रतिपादन केलेले असले तरी नानाविध विषय समर्थांनी हाताळले आहेत. त्यात प्रपंच, राजकारण, समाजकारण, व्यवस्थापन, कुटुंब नियोजन, अर्थकारण, निसर्ग आणि वनस्पती विज्ञान, संगीत यासारख्या अनेक विषयांवर साधकांना मार्गदर्शन केले आहे. या सर्व वाङ्मयातून समर्थांचा विविध विषयांचा प्रचंड व्यासंग दिसून येतो.

त्यांच्या या सर्व वाङ्मयात मनाचे श्लोक हा एक अत्यंत लघु परंतु प्रभावी असा ग्रंथ आहे. तो एक अनमोल असा हिरा आहे जो आपल्या विलक्षण तेजाने झळाळून उठतो. साधी सोपी भाषा हे त्याचे वैशिष्ट्य आहे. ज्ञानयोग, कर्मयोग, भक्तीयोग, सदाचार, सत्संग, सगुण निर्गुण, सुखदुःख, नाम आणि ध्यान यासारख्या अनेक विषयांना समर्थांनी या छोटेखानी ग्रंथात स्पर्श केला आहे. मनाच्या श्लोकांना मनोबोध असेही म्हटले जाते. विनोबा भावेंनी तर त्याला मनोपनिषद असे सार्थ नाव दिले आहे.

मनाचे श्लोकात समर्थांनी प्रत्येक विषयाचे तर्कशुद्ध थोडक्यात विश्लेषण केले आहे. व्याकरणदृष्ट्या सुद्धा हा ग्रंथ परिपूर्ण आहे. यातील श्लोक भुजंगप्रयात या वृत्तात लिहिले गेले असून ते सुरेख असे चालीवर म्हणता येतात हे त्यांचे वैशिष्ट्य आहे. मनाच्या श्लोकांचा अनेक भाषांमध्ये अनुवाद देखील झाला आहे.

समर्थांचे दासबोध हे महाकाव्य तर प्रसिद्धच आहे परंतु सर्वांनीच दासबोध वाचला असेल असे काही सांगता येत नाही. परंतु ज्याला ज्याला मराठी येते त्याला लहानपणापासूनच मनाच्या श्लोकांचा परिचय असतो. कोणत्या ना कोणत्या मार्गाने मनाचे श्लोक लहानपणापासून सतत त्याच्या कानावर पडत असतात. अशाच प्रकारचा मनाच्या श्लोकांचा प्रभाव लहानपणापासून माझ्यावरही आहे. लहानपणी मी ते पाठ केले आणि आजपर्यंत ते वेगवेगळ्या प्रसंगी ऐकत आलो. लहानपणी ते पाठ करायचे म्हणून केले होते परंतु त्यांचा अर्थ फारसा कळत नव्हता. आताही तो फार कळतो आहे अशातला भाग नाही. परंतु जीवन जगण्यासाठी या मनाच्या श्लोकांची फार मोठी मदत आपल्याला होऊ शकते एवढी गोष्ट मात्र माझ्या लक्षात आली आणि त्याच उद्देशाने हा मनाच्या श्लोकांवर लिहिण्याच्या लेखमालेचा प्रपंच आरंभला आहे.

मनाचे श्लोकांचे वैशिष्ट्य म्हणजे कोणताही उपवास किंवा जपजाप्य यात सांगितले नाही. कोणत्याही कठोर नियमांचे पालन करायचे नाही. हा आपल्या स्वतःच्या मनाला केलेला उपदेश आहे. आपले मनच आपला मित्र किंवा शत्रू असते. प्रपंच असो किंवा परमार्थ तो करण्यासाठी आपले मन आपल्याला अनुकूल असावे लागते. बहिणाबाई म्हणतात,’ मन वढाय वढाय, उभ्या पिकातलं ढोर, किती हाकला हाकला फिरी येतं पिकावर.’ मन हे अतिशय चंचल आहे म्हणूनच अशा या मनाला समर्थांनी उपदेश केला आहे. मनाला आजार झाला असेल तर औषध मनालाच द्यावे लागते. म्हणूनच समर्थांनी जनसामान्यांच्या कल्याणासाठी हा मनाच्या श्लोकांचा प्रपंच केला असे म्हणता येईल.

मराठी साहित्यातील आणि संतकाव्यातील ‘मनाचे श्लोक’ हे केवळ आध्यात्मिक काव्य नसून, ते मानवी मनाला उन्नत करणारे एक प्रगत ‘ मानसशास्त्र ‘ आहे. १७ व्या शतकात समर्थ रामदास स्वामींनी रचलेले हे २०५ श्लोक आजही तितकेच प्रस्तुत वाटतात, याचे मुख्य कारण म्हणजे यात केवळ परमार्थाची चर्चा नसून हे ‘ मनावर ‘ विजय मिळवण्याचे प्रयोगात्मक शास्त्र आहे.

मला नेहमी प्रश्न पडतो की, समर्थांनी मनाला उद्देशून बोलताना ‘ मना सज्जना ‘ अशी साद का घातली असावी ? पण आपण मनाचे श्लोक जेव्हा वाचतो किंवा अभ्यासतो तेव्हा लक्षात येते की समर्थ रामदासांचा मानवी मनाचा अभ्यास खूप मोठा आहे. आपले मन हे अत्यंत चंचल आहे. ते जसे अधोगतीला नेऊ शकते, तसेच ते मोक्षाचा मार्गही प्रशस्त करू शकते. म्हणूनच समर्थांनी मनाला ‘ सज्जन ‘ संबोधून प्रथम त्याच्यातील सात्विकतेला जागृत केले आहे. आपल्याकडे घरात आई-वडील जेव्हा मुलांना समजून सांगतात तेव्हा शहाणी मुले असं करत नाहीत असं म्हणतात म्हणजेच ते शहाणा म्हणून आपल्यातील चांगुलपणाला आवाहन करतात. समर्थांनी देखील आपल्या मनाला तशाच प्रकारचे आवाहन केले आहे.

समर्थांच्या या रचनेला मला या ‘ मनोपनिषद ‘ म्हणणे अधिक योग्य वाटते, कारण उपनिषदांचा गाभा असलेल्या ‘ब्रह्मविद्येला’ समर्थांनी अत्यंत सोप्या भाषेत जनसामान्यांच्या उंबरठ्यापर्यंत आणले आहे. जिथे उपनिषदे ‘तत्वमसि’ (ते तूच आहेस) असा गहन संदेश देतात, तिथे समर्थ ‘मना सज्जना राघवी वस्ति कीजे’ असे सांगून त्या तत्त्वाची अनुभूती घेण्याचे साधन आपल्याला देतात. मनाला शिस्त लावणे, षडरिपूंवर विजय मिळवणे आणि विवेकाच्या साह्याने जगणे, ही या मनोपनिषदाची प्रमुख सूत्रे आहेत.

या लेखमालेत आपण समर्थांच्या मनाचे श्लोक – मनोपनिषद या अजरामर कृतीचा धांडोळा घेणार आहोत. त्यातून आपल्या मनाचे नियमन कसे करावे, सात्विकतेचा ध्यास कशा प्रकारे घेता येईल आणि अध्यात्मिक उन्नतीचा मार्ग कसा प्रशस्त होईल हे समजण्यासाठी मदत होईल.

यात समर्थांनी केवळ भक्ती नाही, तर ‘विवेक’ (योग्य-अयोग्य निवडण्याची शक्ती) वाढवण्यावर भर दिला आहे. मनात चालणाऱ्या सुख-दुःख, आशा-निराशा यासारख्या द्वंद्वांवर कशी मात करावी हे यातून सांगितले आहे. तसेच परमेश्वर प्राप्तीचा किंवा साधनेचा सोपा मार्ग समर्थ या श्लोकातून आपल्याला सांगतात. कठीण योगाभ्यासापेक्षा ‘नामस्मरण’ आणि ‘सदाचार’ यातून मन शुद्ध होते यावर त्यांचा भर आहे. आजच्या काळात जेव्हा समाज स्वत्व विसरला आहे, नैतिक मूल्यांचा पाया डळमळीत झाला आहे अशा परिस्थितीत समाजाला नैतिक अधिष्ठान प्राप्त करून देण्यासाठी मनाच्या श्लोकांची फार मोठी मदत होऊ शकेल. ज्याप्रमाणे शरीर शुद्धीसाठी व्यायामाची गरज असते, तशी चित्तशुद्धीसाठी या श्लोकांची गरज आहे असे मला वाटते. मनाच्या श्लोकातील प्रत्येक श्लोकाला सुभाषिताचे मोल आहे. आपण ठरवले तर प्रत्येक श्लोक हा एक अमीट मानसिक संस्कार (Psychological Impression) होऊ शकतो. 

– क्रमशः भाग पहिला 

© श्री विश्वास देशपांडे

चाळीसगाव

प्रतिक्रियेसाठी ९४०३७४९९३२

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ ‘मलेरियाविरोधी औषधांची कूळकथा…’ ☆ डाॅ. मीना श्रीवास्तव ☆

डाॅ. मीना श्रीवास्तव

? इंद्रधनुष्य ?

 

☆ ‘मलेरियाविरोधी औषधांची कूळकथा…’ ☆ डाॅ. मीना श्रीवास्तव ☆

मलेरियाविरोधी औषधांची कूळकथा – – 

औषधांच्या निर्मितीचा इतिहास…

कुठलेही औषध हे मानवी बुद्धीच्या आवाक्याच्या अंतिम टोकापर्यंत जाऊन देखील संपूर्णतः नवीन संरचना घेऊन येत नसते. त्याची सुरुवात ईश्वराद्वारे निर्मित या चल-अचल सृष्टीच्या कुठल्यातरी कोपऱ्यापासून सुरु होते. उदाहरण द्यायचे तर मानवी वंशाची उत्पत्ती! ब्रह्मदेवाने सृष्टी निर्माण करण्याच्या इच्छेने ध्यान केले. तेव्हा त्यांच्या शरीरातून दोन रूपे प्रकट झाली – एक पुरुष रूप (मनु) आणि दुसरे स्त्री रूप (शतरूपा). स्वयंभुव मनु आणि शतरूपा हे पृथ्वीवरील अनुक्रमे पहिले पुरुष आणि स्त्री मानले जातात. नंतरची वंशवृद्धी होत मानवजातीचा विस्तार झाला.

हे आठवण्याचे कारण मलेरियाशी निगडित आहे. मलेरियाविरोधी औषधांची कुळकथा मला तरी खूपच चित्तवेधक वाटते. दक्षिण अमेरिकेत १६०० साल पासून सिंकोना झाडाची साल ज्वरनाशक, वेदनाशामक आणि टॉनिक म्हणून वापरली जात होती. अंदाजे १६३० मध्ये जेसुइट मिशनऱ्यांनी युरोपियन लोकांमध्ये त्याचा प्रसार केला म्हणून ही साल “जेसुइट्स पावडर” म्हणून प्रचलित झाली. १८२० साली या सालींतील मलेरियाविरोधी औषधी गुणधर्म असलेले मुख्य रसायन कुनैन (क्विनाइन) शोधण्यात आले. मंडळी, हे कुनैन ऐतिहासिक मलेरियाविरोधी औषध आहे, नंतर जवळपास २००० साल पर्यंत याच ऐतिहासिक कुनैन नामक औषधाच्या मूळ रासायनिक रचनेवर आधारित शेकडो मलेरियाविरोधी औषधे प्रयोगशाळेत तयार करण्यात आली. (आजचे अकल्पित स्वस्त कुनैन संपूर्णपणे कृत्रिमरित्या तयार होते.)

घरातील वृद्ध माणूस नकोसे झाले की त्याला अडगळीच्या खोलीत किंवा वृद्धाश्रमात रवाना करतात. कुनैनचे तसेच झाले. त्याचे दुष्परिणाम भरपूर होते. कारण कुनैनपेक्षा सुरक्षित भासणारी नवतीची विविधप्रकारे आकर्षक परिधान धारण करणारी औषधे प्रयोगशाळेतून बाहेर पडत होती. पण ज्याला विषारी औषध म्हणून हद्दपार करण्यात आले होते, तेच जुनेपुराणे जाडेभरडे वस्त्रांकित कुनैन आज नव्या औषधांना दाद न देणाऱ्या मलेरिया परजीवींकरता कर्दनकाळ ठरले आहे. हाताबाहेर गेलेल्या रुग्णांचे जीव याच वृद्ध औषधाने वाचवले आहेत. मैत्रांनो, कित्येक नवथर क्वीन्स आल्या अन गेल्या, मात्र क्विनाईन या ओरिजिनल क्वीनचे राजेशाही महत्व अजूनही शिल्लक आहे. म्हणूनच मंडळी, नम्रपणे विनंती करते की वय झालेल्या माणसाला आणि औषधाला कमी लेखू नका.

‘युध्दस्य कथा रम्या’ असे जो कोणी म्हणत असेल त्याने खालील प्रकरणे अवश्य नजरेखालून घालावीत! दुसरे जागतिक महायुद्ध कित्येक कारणांसाठी ऐतिहासिक ठरले. मात्र औषधशास्त्राच्या दृष्टीने ते खूपच संस्मरणीय ठरले. जर्मनीतील अघोरी कॉन्सन्ट्रेशन कॅंप्समध्ये सरेआम हजारो ज्यूजला यमसदनी धाडणाऱ्या गॅस चेम्बर्समधील अतिविषारी वायू, त्यांची सख्खी, चुलत, आत्ये, मामे आणि मावसभावंडे म्हणजे कीटक नाशके, तसेच एलएसडी आणि तत्सम भ्रमित करणारी व व्यसनाधीनता आणणारी औषधे याच भीषण काळातली! त्यांच्या शोधामागील भयावह उद्देश एकच होता, शत्रूच्या किंवा ज्यूजसारख्या नको असलेल्या जमातींचा ग्रुप मर्डर! या औषधांच्या संशोधनाच्या आणि वापराच्या बाबतीत डॉक्टर्स आणि नर्सेस द्वारा यत्किंचितही विधिनिषेध पाळले गेले नाहीत. या मृत्यूदात्यांचे हे ‘पाशवी’ च्या पलीकडले क्रूर प्रकरण वैद्यकीय शास्त्राला काळिमा फासणारे ठरले.

दुसऱ्या महायुद्धादरम्यान जापानी सैन्याने १९४२ साली इंडोनेशियावर आक्रमण केले आणि जावावर नियंत्रण मिळवले. जावा त्यावेळी जवळपास ९५% सिंकोना झाडाच्या घटकांचे उत्पादन करत होता. या जापानी विजयामुळे मित्र राष्ट्रांच्या सैन्याला क्विनाइनचा पुरवठा बंद झाला. पॅसिफिक आणि आफ्रिकन क्षेत्रात हजारो सैनिक मलेरियामुळे मरण पावले. मंडळी, गरज ही शोधाची जननी असते. कुनैनला पर्यायी कृत्रिम औषधनिर्मिती ही काळाची गरज बनली. क्विनाइनपासून प्रेरित पहिले कृत्रिम औषध एटेब्रिन (मेपाक्रिन) याचा ‘एटेब्रिन ग्लो’ (कातडीवर दुष्परिणाम होऊन ती पिवळी पडणे), मानसिक, रक्ताच्या उत्पादनावर तसेच यकृतावरील दुष्परिणाम चिंताजनक होते. गंमत म्हणजे बायर या जर्मन कंपनीने ज्याला १९३४ मध्ये घातकी औषध म्हणून टाकून दिले होते, त्याचेच पुनःपरिक्षण करीत महायुद्धाच्या शेवटी शेवटी अमेरिकेच्या खास मलेरियाविरोधी मोहिमेत क्लोरोक्विन या अत्युत्तम औषधाचा पुनर्जन्म झाला. मैत्रांनो! त्याच्या वैद्यकीय चाचण्या जालीमच होत्या. आफ्रिकेच्या जंगलात युद्धकैद्यांना सोडून देणे, त्यांना मलेरिया झाला की त्यातील निवडक व्यक्तींना हे औषध देणे, आणि इतरांचे रक्षण ईश्वर करो ही घातक भावना जपत हे मलेरियाविरोधी क्रांतीकारक क्लोरोक्विन १९४७ साली एकदाचे बाजारात आले. १९७० ला परजीवींचा प्रतिकार उदयास येईपर्यंत ते मोठ्या प्रमाणावर वापरले जाणारे औषध बनले. मात्र ‘अती तेथे माती’! प्लाझमोडियम गप्प कसे बसणार? १९७० साल उजाडेपर्यंत क्लोरोक्विन फॅल्सीपॅरम वर निष्प्रभावी ठरले. परिणाम काय तर यत्र तत्र सर्वत्र क्लोरोक्वीनविरुद्ध फॅल्सीपॅरमच्या निकराच्या लढतीत क्लोरोक्वीनने मान टाकली.

यावर उपाय म्हणून विएतनामचे युद्धबंदी, शिवाय देशांतर्गत बंदिगृहातील कैदी या परस्वाधीन मानवसमूहाची तथाकथित संमती (? ) मिळवून त्यांच्यावर प्रयोग करून यूएस आर्मी मेडिकल रिसर्च अँड डेव्हलपमेंट कमांडद्वारा मलेरियाविरोधी जहाल प्रकल्प राबवले गेले. मेफ्लोक्विन हे अपत्य (१९७०) त्या दरम्यान विकसित झाले. त्याचा फायदा एकच.. तो म्हणजे ३ किंवा ४ गोळ्यांचा एकल डोज!

.. अशी ही कथा ज्यात भविष्यात आणखी बदल अपेक्षित असतातच.

 

©  डॉ. मीना श्रीवास्तव

ठाणे

मोबाईल क्रमांक ९९२०१६७२११, ई-मेल – drmeenashrivastava21@gmail.com

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ श्री रविंद्रनाथ टागोर यांची “गीतांजली”… भाग – १० ☆ सौ.मंजिरी येडूरकर ☆

श्री मंजिरी येडूरकर

? इंद्रधनुष्य ?

☆ श्री रविंद्रनाथ टागोर यांची “गीतांजली”… भाग – १० ☆ श्री मंजिरी येडूरकर ☆

श्री रविंद्रनाथ टागोर

रविंद्रनाथ टागोरांच्याविषयीचा आदर व्यक्त करण्यासाठी त्यांचे पुतळे केवळ भारतात (प. बंगाल, चेन्नई, हैदराबाद, मैसूर, अर्नाकुलम, लखनौ) व बांगलादेशातच नव्हे तर आशिया, युरोप, रशिया खंडातील अनेक देशात स्थापित करण्यात आले आहेत. उदाहरणादाखल कांही नावे बघू.

  1. गॉर्डन स्क्वेअर, लंडन, यू के
  2. फ्रेंडशिप पार्क, मॉस्को, रशिया
  3. कॅथलिक युनिव्हर्सिटी, ल्युवेन, बेल्जियम
  4. बॅलटनफर्ड, हंगेरी
  5. लोझान युनिव्हर्सिटी, स्वित्झर्लंड
  6. भारतीय दूतावास, बीजिंग, चीन
  7. सोल, द. कोरिया
  8. बोरोबदूर, माजेलिंग, योग्यकार्टा, जावा, इंडोनेशिया
  9. तुर्कमेनिस्तान
  10. डब्लिन, आयर्लंड
  11. स्लिगो, आयर्लंड
  12. मक्वारी विद्यापीठ, सिडनी, ऑस्ट्रेलिया
  13. कॅनबेरा, ऑस्ट्रेलिया

—– 

☆ गीत : २८ ☆

OBSTINATE are the trammels, but my heart aches when I try to break them.

Freedom is all I want, but to hope for it I feel ashamed. I am certain that priceless wealth is in thee, and that thou art my best friend, but I have not the heart to sweep away the tinsel that fills my room.

The shroud that covers me is a shroud of dust and death; I hate it, yet hug it in love. My debts are large, my failures great, my shame secret and heavy; yet when I come to ask for my good, I quake in fear lest my prayer be granted.

—–

☆ मराठी भावानुवाद : गीत २८ ☆

*

बंधनांस झुगारता

वेदनेचा दाह उरी

मुक्तता हवी जरी 

न दिसे ती दूरवरी॥

*
अमूल्य धनदौलत तू

तूच प्राणसखा हरी

सभोवती झगमगाट

त्यागण्या न धीर परी॥

*
लौकिका कवटाळून

बसलो जरी नावडे

अप्रिय जे तेच प्रिय 

कल्पना ही आवडे॥

*

अपयशी पदोपदी

ऋणाईत असे जरी

पापांचे मम ओझे

भासतसे जड भारी॥

*

या सर्वांतून सुटका हो

जरी तुझी कृपा मिळो

प्रार्थित मी, परी मनी

वांछित ती नच मिळो॥

*

भावानुवाद © मंजिरी येडूरकर 

संपर्क: ९४२१०९६६११

——

☆ गीत २९ ☆

HE whom I enclose with my name is weeping in this dungeon. I am ever busy building this wall all around; and as this wall goes up into the sky day by day I lose sight of my true being in its dark shadow.

I take pride in this great wall, and I plaster it with dust and sand lest a least hole should 

be left in this name; and for all the care I take I lose sight of my true being.

—–

मराठी भावानुवाद : गीत २९

*

माझ्या नावात जो अध्याहृत आहे

तो या कैदखान्यात रडतो आहे

मी त्या भोवती उंच भिंती बांधतो आहे

जसजशा या भिंती आकाशात घुसत आहेत

तो माझ्या नजरेपासून हटत आहे

मला या भिंतींचा अभिमान आहे 

मी त्यांना काळजीपूर्वक गिलावा करतो आहे

जेणेकरून त्याची खूणही राहणार नाही

हुश्श, आता त्या भिंतीच्या आतला तो…

माझा सद्सद्विवेक, माझ्या दृष्टिपथातही नसेल!!

 

भावानुवाद © मंजिरी येडूरकर

संपर्क: ९४२१०९६६११

—–

☆ गीत ३० ☆

I CAME out alone on my way to my tryst. But who is this that follows me in the silent dark?

I move aside to avoid his presence but I escape him not.

He makes the dust rise from the earth with his swagger; he adds his loud voice to every word that I utter.

He is my own little self, my lord, he knows no shame; but I am ashamed to come to thy door in his company.

—-

☆ मराठी भावानुवाद : गीत ३० ☆

*

तव भेटीस्तव आतुर झालो

संकेत स्थळी जाऊ लागलो॥

*

एकटाच मी जातो पुढती

सखे सोयरे मागे पडती॥

*

सतत परंतु कुणी मागे येई

त्यातून सुटका माझी न होई॥

*

तोऱ्यातच तो धुरळा उडवी

माझ्या शब्दा तीव्र बनवी॥

*

कळले मजला हे प्रभुराया

क्षमा करी मज पडतो पाया॥

*

माझ्यामधला अहंहे घडवी

लाज शरम ना त्याला अडवी॥

*

त्याच्या सोबत तुझिया दारी

येऊ न शकतो तव दरबारी॥

*

येईन तेंव्हा, देईन सोडूनि

अहंकार मम जेंव्हा त्यागुनि॥

*

– क्रमशः भाग १०.

मूळ इंग्लिश काव्य : श्री. रविंद्रनाथ टागोर.

भावानुवाद : कवयित्री : © सौ.मंजिरी येडूरकर

लेखिका व कवयित्री, मो – 9421096611

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ जे मिळालं आहे तेच पुरेसं आहे!! – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – श्री सुनीत मुळे ☆

श्री सुनीत मुळे

 

? इंद्रधनुष्य ?

☆ जे मिळालं आहे तेच पुरेसं आहे!! लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – श्री सुनीत मुळे 

दिल्लीतील एका मल्टिनॅशनल कंपनीत मॅनेजर पदावर काम करणारा एक तरुण पर्यटक आपल्या कुटुंबासह एक आठवड्याच्या सुट्टीसाठी लडाखला आला होता. तिथे त्याला जो ड्रायव्हर मिळाला तो साधारण अठ्ठावीस वर्षांचा असावा. त्याच्या कुटुंबात वृद्ध आई-वडील, पत्नी आणि दोन मुली होत्या.

प्रवासात बोलणं सुरू झालं.

पर्यटक: या आठवड्याच्या शेवटी पर्यटन हंगाम संपेल. मग तुम्ही काय करता? गोवा, दिल्ली किंवा इतर मोठ्या शहरांत हॉटेलमध्ये काम करायला जाता का?

तरुण: नाही, मी इथेच राहतो. लडाख सोडून कुठेही जात नाही.

पर्यटक: इथे तर हिवाळ्यात गोठवणारी थंडी असते. तेव्हा काय करता?

तरुण: फारसं काही नाही, फक्त सियाचिनला जातो.

पर्यटक (आश्चर्याने): सियाचिन? तिथे तर इथल्यापेक्षा जास्त थंडी असते!

तरुण: मी तिथे भारतीय लष्करासाठी लोडर म्हणून काम करतो. हे कंत्राटी काम असतं. मी आणि माझ्यासारखे काही लोक इथून सुमारे अडीचशे किलोमीटर पायी चालत सियाचिन बेस कॅम्पपर्यंत जातो. त्यासाठी पंधरा दिवस लागतात. तिथे वैद्यकीय तपासणी होते. फिट असलो तर गणवेश, बूट, गरम कपडे, हेल्मेट मिळतं. मग तीन-चार महिने तिथेच राहून काम करतो.

पर्यटक: तिथे काम काय करावं लागतं?

तरुण: सामान वाहून नेणं. जे काही आवश्यक असतं ते आर्मी एअरड्रॉप करते. आम्ही ते पाठीवर उचलून एका पोस्टवरून दुसऱ्या पोस्टवर पोहोचवतो.

तो संपूर्ण भाग हिमनद्यांचा आहे. तिथे ट्रक चालत नाहीत. बर्फावर चालणाऱ्या स्कूटर्सचा आवाज होतो, त्यामुळे शत्रू गोळीबार करू शकतो. म्हणून आम्ही रात्री साधारण दोन वाजता निघतो. टॉर्चही लावता येत नाही. पूर्ण शांतपणे, अंधारात चालावं लागतं. तिथे ना घोडे असतात ना खच्चर. मायनस पन्नास अंश तापमानात आणि अठरा हजार फूट उंचीवर कोणताही प्राणी जिवंत राहू शकत नाही.

पर्यटक (गंभीर आवाजात): तिथे ऑक्सिजनही कमी असतो. इतकं ओझं कसं उचलता?

तरुण: म्हणूनच पंधरा किलोहून जास्त वजन नसतं आणि दिवसाला फक्त दोन तास काम. उरलेला वेळ फक्त शरीर जिवंत ठेवण्याचा प्रयत्न.

पर्यटक: हे तर जीवघेणं आहे…

तरुण काही क्षण शांत राहिला, मग म्हणाला—

अनेक मित्र परत आलेच नाहीत. कोणी दरीत कोसळलं, कोणी शत्रूच्या गोळीने मारलं गेलं, आणि सर्वात मोठा धोका म्हणजे फ्रॉस्टबाईट… एकप्रकारे मृत्यू अटळच.

पर्यटक: मग तुम्हाला चांगला पगार तरी मिळत असेल?

तरुण: अठरा हजार रुपये महिन्याला. सगळा खर्च लष्कर उचलतं, त्यामुळे तीन महिन्यांत साधारण पन्नास हजार रुपये वाचतात. ते भरपूर आहेत. घर चालतं आणि सर्वात महत्त्वाचं—देश आणि लष्करासाठी काहीतरी करण्याचं समाधान मिळतं.

दिल्लीचा तो पर्यटक गप्प झाला. पन्नास लाखांच्या पॅकेजमध्ये, एसी ऑफिस आणि ऐषआरामाच्या आयुष्यात जगणारा तो माणूस, पहिल्यांदाच स्वतःला लहान वाटू लागला.

इथे—मायनस पन्नास अंश तापमान, अठरा हजार आठशे पंचाहत्तर फूट उंची, सकाळचे दोन वाजता, मृत्यूची सावली सोबत—दिवसाला सहाशे रुपयांची कमाई “फार” वाटते आणि देशासाठी काहीतरी केल्याची भावना आयुष्याला अर्थ देते.

शहरांत बसून ज्ञान पाजळणारे, सोशल मीडियावर विष ओकणारे—त्यांच्यातील कुणातही इतकं धैर्य नाही की त्या अंधाऱ्या, बर्फाळ शांततेत दहा मिनिटं तरी उभं राहावं.

तुम्ही तुमच्या मुलाला मॉलमध्ये शॉपिंग करायला घ्या, पिझ्झा खाऊ घाला; पण कधीतरी ही गोष्टही त्याला नक्की सांगा, जेणेकरून त्याला कळेल—या देशाची खरी रीढ कुठे आहे.

आपण सगळ्यांनी आपल्या मुलांना हे समजावून सांगावं की देशभक्ती म्हणजे फक्त घोषणा देणं किंवा चर्चा करणं नाही, तर त्याग, शिस्त आणि कर्तव्य यांतून ती जन्माला येते.

पुढच्या वेळी आपण आरामदायी खोलीत बसलेलो असू, तेव्हा एक क्षण थांबून त्या लोकांना आठवूया—जे रात्री दोन वाजता, अंधार आणि बर्फाच्या सान्निध्यात, आपल्या शांततेचं ओझं पाठीवर उचलून उभे असतात.

कारण ते आहेत म्हणूनच आपण आहोत.

राम रक्षा स्तोत्र –

राम रामेति रामेति, रमे रामे मनोरमे ।

सहस्रनाम तत्तुल्यं रामनाम वरानने ।।

सदैव प्रसन्न रहा!!

जे मिळालं आहे—तेच पुरेसं आहे!!

लेखक : अज्ञात  

प्रस्तुती – श्री सुनीत मुळे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ म्हातारा एसटी ड्रायव्हर… – लेखक : श्री प्रकाश फासाटे ☆ प्रस्तुती– सौ. उज्ज्वला केळकर ☆

सौ. उज्ज्वला केळकर

? इंद्रधनुष्य ?

☆ म्हातारा एसटी ड्रायव्हर… – लेखक : श्री प्रकाश फासाटे ☆ प्रस्तुती– सौ. उज्ज्वला केळकर

नाशिकच्या आगारातून नाशिक श्रीरामपूर एसटी निघाली. मी थेट श्रीरामपूर पर्यंत तिकीट काढले होते.

प्रवास मग तो कोणताही असो, तुम्हाला खूप काही शिकवतो, अनुभव देतो, विचार करायला लावतो.

बाहेर जोरदार पाऊस चालू होता, त्याही परिस्थितीत एसटी अगदी वेळेवर सुटली, तिला शहरातून बाहेर पडायला थोडा वेळ लागला कारण एक तर पावसाचे दिवस आणि त्यात रस्त्यावर भयंकर वाहने…!!

एसटी शहरातून बाहेर पडली. थोड्याच वेळात वेगाने सिन्नरच्या बाजूला निघेल असे सर्वांना वाटले. त्या एसटीने मात्र अतिशय संथ गतीमध्ये सिन्नर गाठले.

एसटीमध्ये बसलेले बहुतेक प्रवासी हे संगमनेर, प्रवरानगर आणि श्रीरामपूरचे होते, तिचा अतिशय हळू असलेला वेग पाहून आता प्रवाशांमध्ये कुजबूज सुरू झाली. एसटीमध्ये बसलेलं काही तरुण मुलांच टोळक होत, इतरही काही लोक बसलेले होते. पण सगळ्यांचा सूर एकच, एसटी खूप हळू चाललीय.

प्रत्येक जण एसटीच्या चालणाऱ्या संथ वेगामुळे थोडा नाराज झाला होता.

अगदी मलाही जाणवत होतं की एसटीचा वेग खूपच हळू आहे, पण मला अशी काही घाई नव्हती, माझ्यासाठी तो वेग योग्य होता इतकाही काही कमी नव्हता.

लोकांचा चाललेला चर्चेचा विषय बघून मी एक उत्सुकता म्हणून ड्रायव्हर कडे बघितले.

ड्रायव्हरची ती पाठमोरी आकृती मला दिसली. साधारण 55 ते 60 च्या आसपास वय असलेली ती व्यक्ती होती. डोक्याला पूर्ण टक्कल पडलेले होते, बिचारा गाडी चालवताना वाकला होता, त्याच्या खाकी शर्ट मधून दिसणाऱ्या दोन हातांवरून मला त्याच्या बारीक शरीरयष्टीची कल्पना आली.

जशी एसटी पुढे चालली होती, लोक ड्रायव्हर बद्दल एकमेकांत बोलत होते, मी सगळ्यांच्या चर्चा ऐकत होतो, प्रत्येकाचे वैयक्तिक मत मला ऐकू येत होते.

गाडीचा वेग मात्र अगदी तसाच होता. काही गाडीतील लोक वैतागले सुद्धा…!!!

तेवढ्यात त्या टोळक्यातील एक जण उठला आणि ड्रायव्हरच्या कॅबिन कडे गेला.

“अहो काका, गाडीला थोडा वेग द्या ना. हया वेगाने गेलो तर आपण खूप उशिरा पोहचू. ” तो मुलगा ड्रायव्हरला जाऊन भिडला.

ड्रायव्हरने त्या मुलाकडे बघितले आणि मान हलवली. त्यावेळी मला ड्रायव्हरचा चेहरा दिसला. त्याचा चेहरा मला थकलेला वाटला.

पुढे दोन तासाने गाडी चहा नाश्त्यासाठी थांबली. आम्ही सगळेजण उतरलो होतो, ते दोघेही वाहक आणि चालक आमच्यापासून दूर बसून चहा नाश्ता घेत होते, इकडे मात्र त्या तरुण टोळक्यांची ड्रायव्हर बद्दल टीका आणि त्यांची चेष्ठा करण्याचे काम चालूच होते.

मी त्यांच्या बाजूलाच बसलो होतो.

आता मात्र त्यांच्या टिकेने मर्यादा सोडली. एक जण त्यांना म्हातारा ड्रायव्हर म्हणत होता, तर दुसरा टकल्या म्हणत होता.

हे ऐकून मला मनातून खूप वाईट वाटले.

काही का असेना, आपल्यापेक्षा वयाने मोठ्या असलेल्या माणसाचा आदर हा राखलाच पाहिजे. आपण आपल्या घरातल्या मोठ्या व्यक्तीबद्दल असं बोलतो का?

आपण पैसे देऊन तिकीट घेतले म्हणजे आपल्याला वैयक्तिक टीकेचे अधिकार मिळतात असं नाही.

पण त्या तरुण पिढीला कोण समजावून सांगणार होतं? त्यांच्या चर्चेमध्ये आपण नाक खुपसणे म्हणजे वादाला तोंड फुटणार, तेव्हा शांत राहणेच उत्तम…

पुढे गाडीचा वेग काही वाढला नाही. त्याच वेगात भर पावसामध्ये गाडी श्रीरामपूर कडे निघाली होती.

एसटी बाभळेश्वर स्थानक सोडून श्रीरामपूर जवळ आली. एसटीमध्ये आता मोजकेच आठ-दहा लोक उरले होते. ड्रायव्हरला नाव ठेवणारी त्या तरुण मुलांची टोळी काही संगमनेरला उतरली आणि काही प्रवरानगरला…

मी आणि काही प्रवासी आम्ही नाशिकपासून सोबत होतो.

संध्याकाळचे पाच वाजले, पाऊस जवळपास उघडला होता. मावळतीच किंचित ऊन पडलं होतं. रस्त्यावर आणि एसटी स्टँडवर लोकांची गजबज दिसत होती. समोर जागा असल्यामुळे मी बाभळेश्वरला पुढे येऊन बसलो.

एसटीने श्रीरामपूर स्थानकात प्रवेश केला. माझं सहज लक्ष ड्रायव्हर कडे गेलं, ड्रायव्हर हुंदके देऊन रडत होता. सुरुवातीला मला त्यांच्या रडण्याचे कारण समजलेच नाही.

त्याचं लक्ष समोर होत, आणि समोर जे दृश्य होतं ते पाहून मी गहिवरून गेलो.

बँड पथकाच्या 20 लोकांनी गाडीच्या दुतर्फा दोन रांगा केल्या होत्या. गाडी ज्या ठिकाणी उभी राहणार होती त्या ठिकाणी हे सगळे उभे होते.

तेवढ्यात तीस वर्षाचा अगदी नवीन कपडे घातलेला एक युवक बाहेरून ड्रायव्हरच्या केबिनच्या दरवाजापाशी आला.

हे मी सगळं आतून बघत होतो. त्यांनी हळूहळू गाडी थांबवली आणि बंद केली, गाडीतच आपल्या पायातल्या चपला काढल्या आणि स्टेरिंग ला हात जोडून नमस्कार केला, संपूर्ण गाडीला हात जोडले, वरच्या बाजूला असलेल्या देवांच्या दोन फोटोंना त्यांनी हात जोडले आणि स्टेरिंग वर डोकं ठेवून ढसढसा रडायला लागले, त्यांच्या दोन्ही डोळ्यात पाणी होते.

बाहेर एका स्वरात सर्वांनी त्यांचं टाळ्या वाजवून स्वागत केलं.

त्यांच्या मुलाने कॅबिनचा दरवाजा उघडला, वडिलांना खांद्यावर घेतलं आणि संपूर्ण गाडीला एक फेरी मारली.

गाडीच्या समोर त्यांची पत्नी, दोन सुना, मुलगा, मुलगी, जावई सगळा परिवार त्यांच्या स्वागतासाठी नवीन कपडे घालून उभा होता.

बँड पथकाने त्यांचं अतिशय भव्य स्वागत केल. गाडीच्या समोर उभे असलेल्या प्रत्येक नातेवाईकांच्या डोळ्यात पाणी होत.

मुलाने वडिलांना खांद्यावर घेऊन पूर्ण गाडीला फेरी मारल्यानंतर गाडीच्या समोर ठेवलेल्या एका पाटावर उभे केले.

हा क्षण बघून माझ्या डोळ्यात कधी पाणी आलं मला कळलेच नाही, तो एक भावनिक क्षण होता.

काका आज निवृत्त झाले होते.

आज त्यांच्या कामाचा शेवटचा दिवस होता.

पाटावर उभ्या असलेल्या काकांचे त्यांच्या बायकोने पाय धुतले. सर्वांनी त्यांना ओवाळले, प्रत्येक जण त्यांच्या गळ्यात एक हार टाकत होता, त्यांना शाल आणि श्रीफळ भेट देत होता, त्यांच्या डोळ्यातील अश्रू मात्र थांबत नव्हते, त्यांना आता गहिवरून आलं.

तेवढ्यात स्थानकाचे मुख्य अधिकारी त्या ठिकाणी आले. त्यांच्या हस्ते त्या काकांचा सत्कार करण्यात आला. कुटुंबातील सर्वजण अभिमानाने त्यांच्याकडे बघत होते.

स्थानकाच्या मुख्य अधिकाऱ्याने सांगितले “, सोनवणे काकाकडून त्यांच्या संपूर्ण नोकरीच्या काळात एकही अपघात झाला नाही, ही त्यांच्यासाठीच नाही तर स्थानकासाठी सुद्धा अतिशय गौरवाची बाब आहे. ” काकांनी मात्र अतिशय नम्रपणे हात जोडले.

कोणतेच काम छोटे किंवा मोठे नसते. त्या कामावरची निष्ठाच तुम्हाला छोटे किंवा मोठे बनवते.

तो क्षण बघून मलाही राहवले नाही. समोरच्याच दुकानातून एक चांगले भिंतीवरचे घड्याळ गिफ्ट म्हणून मी पॅक करून घेतले, आणि त्या गर्दीत काकांच्या हातात ठेवले, त्यांचे दर्शन घेतले. ही व्यक्ती मला परत कधीच भेटणार नव्हती, परंतु त्यांच्या कामावरच्या निष्ठेतून मात्र मी खूप काही शिकणार होतो.

चालक, खरोखर एक देवाचाच अवतार असतो मग तो कोणताही का असेना, त्याच्या भरवशावर आपण निश्चिंत प्रवास करतो, अगदी बिनधास्त झोपतो, हा आपण त्यांच्यावर ठेवलेला विश्वास असतो आणि ते सुद्धा विश्वासाला पात्र ठरतात आणि त्या विश्वासाला पात्र ठरणारे सोनवणे काका सारखे कित्येक लोक असतात.

ते सगळे निघून जोपर्यंत मी तिथेच थांबलो.

त्यांच्या जीवनाचा एक टप्पा संपला होता, दुसऱ्या टप्प्याला सुरुवात होणार होती.

लेखक :  श्री प्रकाश फासाटे

मोरोक्को.

 +212661913052

प्रस्तती : सौ. उज्ज्वला केळकर 

संपर्क – निलगिरी, सी-५ , बिल्डिंग नं २९, ०-३  सेक्टर – ५, सी. बी. डी. –  नवी मुंबई , पिन – ४००६१४ महाराष्ट्र

मो.  836 925 2454, email-id – kelkar1234@gmail.com 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares