मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ “जगू या – जिंकू या…” – लेखक : श्री संजय आवटे ☆ प्रस्तुती – श्री मोहन निमोणकर ☆

श्री मोहन निमोणकर 

? मनमंजुषेतून ?

☆ “जगू या – जिंकू या…” – लेखक : श्री संजय आवटे ☆ प्रस्तुती – श्री मोहन निमोणकर

सलमान खान हा काही विचारवंत वगैरे अभिनेता नव्हे. पण, त्याच्या एका मुलाखतीनं मला पार हादरवून टाकलं.

त्याला विचारलं गेलं होतंः “तुझं दुःख तू कोणाशी शेअर करतोस? “

तोवर पोरकट हसत जोक्स मारणारा सलमान एकदम थबकला. गंभीर झाला.

म्हणाला, “कोणाशीच नाही! कारण समजा मी माझ्या सहका-यांसोबत दुःख शेअर केलं, तर ते मला समजावतील. पण, खासगीत हसतील. माझा रडका चेहरा बघून खुश होतील. “

“माझ्या काही मित्रांशी मी ते शेअर करू शकतो. पण, मला भीती आहे की, त्यांना याचाच आनंद होईल की साक्षात सलमान आपल्याशी एवढं पर्सनल काही शेअर करतोय! ” 

“माझ्या खांद्यावर हात ठेऊन, मला समजावताना काही लोकांचा इगो सुखावेल. “

“आईसारखे काही खूप जवळचे लोक आहेत, ज्यांच्याशी मी हे शेअर करू शकतो. पण चिंता अशी आहे की, हे लोक त्यामुळे स्वतःच एवढे निराश होतील, की मला भीती वाटते. “

“त्यामुळे अद्याप तरी मला असं कोणी मिळालेलं नाही की ज्यांच्याशी मी माझं दुःख शेअर करू शकेन! “

***

मनातला हा अंधार खरंच कोणासोबत शेअर करायचा?

आपल्यापैकी प्रत्येकाच्या मनात अंधार आहे. पण, हा अंधार दाखवणारी कोणती ‘इमोजी’ नाही. तो व्यक्त करण्याची कोणाची तयारी नाही. तुझ्या अंधाराशी मी काही नातं सांगत नाही. आणि, माझ्या अंधाराशी तुझा जैव संबंध नाही!

आपल्याही नकळत या अंधाराचं मोठं साम्राज्य तयार झालं आहे, हे आपल्या गावीही नाही.

काही लोक निराश आहेत, खोल डिप्रेशनमध्ये आहेत, हे आपल्याला समजत नाही, असं नाही. पण, उलटपक्षी अनेकदा त्याचं ‘गॉसिप’ होतं, थट्टा होते आणि ‘बरं झालं, आपल्या रस्त्यातला एक स्पर्धक दूर झाला’, असंही लोकांना वाटतं.

तुम्हाला गंमत माहीत आहे? तुम्ही एखाद्या दिवशी ऑफिसमध्ये निराश दिसलात, थकलेले जाणवलात तर लोकांना काळजीच वाटेल, असं नाही. ‘त्याला प्रमोशन नाही मिळत बरं का, बघितलंस ना चेहरा कसा रडवेला दिसत होता त्याचा’, असं गॉसिप होणारच नाही, असं नाही.

कला ही आनंदाची सर्जक शक्यता. पण, आनंदाचे झरे फुलवणा-या या क्षेत्रातले लोक तर एकमेकांचं जगणं संपवून टाकण्यासाठी कसे आणि किती टपलेले असतात, हे तुम्हाला अगदी सामान्य तबलावादकांपासून ते साहित्यापर्यंत आणि गायकांपासून ते बॉलिवूडपर्यंत सर्वदूर दिसेल. कुठलंच क्षेत्र इथं अपवाद नाही.

हा मानवी स्वभाव कसा आहे, तेच समजत नाही.

आपल्यासमोर आपला एखादा मित्र चालता चालता घसरून पडला, तरी ‘रिफ्लेक्स ॲक्शन’सारखे आपल्याला आधी हसू फुटते. मग आपण त्याला उठवण्यासाठी हात देतो!

मला आठवतं, लहानपणी आम्ही सगळेच मित्र सायकल शिकायचो. एखाद्यानं जरा भारीतली सायकल आणली असेल आणि थोडं स्टाइलमध्ये सायकल चालवत गावभर फिरत असेल तर “असा बाराच्या भावात पडावा लागतो ना…” अशी शुभेच्छा असायची!

माणसं दिसतात सोबत, पण किती जखमी करत असतात एकमेकांना! बोचकारत असतात. ओरबाडत असतात. घर नावाचं भारतीय प्रारूप हे तर ऊब कमी देतं आणि ऊर्जा अधिक शोषतं. नस्ते गुंते तयार करतं. सोपं जगणं क्लिष्ट करून टाकतं. कोणीच कोणाशी बोलत नाही. ‘डिप्लोमसी’ सुरू असते सगळी. जिथं ‘प्रेमात पडले’, हे पोरगी आईला सांगू शकत नाही, तिथं आणखी काय संवाद होणार? “माझ्याशी भांडायला, खुन्नस द्यायला मी काय भावकी आहे का त्याची? “, असं गावात सहजपणे बोललं जातं. अशा नात्यांचं काय करायचं?

आपल्यासारख्या आध्यात्मिक देशात तर हा भोंदूपणा भयंकर आहे. भौतिक गोष्टींचे आकर्षण नाही, असे म्हणायचे आणि प्रत्यक्षात मात्र त्यासाठी एकमेकांचा जीव घ्यायला सज्ज व्हायचे! प्रतिभा, प्रयत्न, प्राक्तन याच्या आधारावर प्रगती करण्याची आकांक्षा बाळगण्यात गैर काही नाहीच. पण, त्यासाठी माणसं खोडण्याची, भिंती बांधण्याची ही कसली विखारी विकृती?

अशा वेळी कोण कोणाशी बोलेल? संवाद कसा होईल?

जगणं हे मूलभूत आहे. प्रसिद्धी, पैसा, यश अशी आकांक्षा असू शकतेच, पण ते काही जगण्याचे प्रयोजन नाही. जगणे हेच जगण्याचे प्रयोजन आहे.

तुम्ही कलेक्टर आहात, स्टार आहात, मंत्री आहात, शिपाई आहात, उद्योजक आहात की शेतकरी आहात, यामुळे त्यात काही फरक पडत नाही.

मी बी. एस्सी (ॲग्री) केलं. आमच्याकडं सगळे स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणारे. माझ्या एकट्या बॅचचे पन्नासेक जण तरी आयआरएस, आयपीएससह क्लास वन ऑफिसर वगैरे असतील. काही ग्रामसेवक, काही कृषी पर्यवेक्षक, व्यावसायिक, एलआयसीत ऑफिसर, काही शेतकरीही. आमच्या बॅचचं ‘गेट टुगेदर’ दरवर्षी करायचं, अशी कल्पना दहा वर्षांपूर्वी पुढे आली. सुरूवातीच्या ‘गेट टुगेदर’मध्ये ‘वर्गवाद’ असायचा. डेप्युटी कलेक्टरला आपण ग्रामसेवकापेक्षा थोर असे वाटायचे. किंवा, त्याला नाही वाटले, तरी ग्रामसेवकाला न्यूनगंड असायचा. मग डीवायएसपी मोठा, सुपरवायझर बारका असे सगळे पोटभेद होते. गेल्या दहा वर्षांत सगळ्यांच्या लक्षात आलंय की यामुळं काही फरक पडत नाही, यार. तुझ्याकडे इनोव्हा असेल, माझ्याकडं बाइक असेल, पण त्यामुळं काय फरक पडतो? जगण्यातली धमाल महत्त्वाची. जगण्यावर हक्क प्रत्येकाचा आहे. टेरेस कोणाच्या मालकीचं असलं, म्हणून त्यावरून दिसणारं आकाश त्याच्या मालकीचं थोडंच आहे! आता अशी अवस्था आहे की आम्ही दोन वर्षांपूर्वी गोव्यात आणि गेल्या वर्षी दुबईत ‘गेट टुगेदर’ केलं, तेव्हा हे सगळे भेद मुळासकट उपटले गेले होते. ग्रामसेवक कमिशनरला ×××वर लाथ घालून बेडवरून उठवत होता!

आमचा एक मित्र कॉलेजात टॉपर होता. तो पुढं सायंटिस्ट वा आयएएस होणार, अशी आम्हाला खात्री होती. पुढं अगदी सामान्य मार्कांची पोरं एसपी, कमिशनर वगैरे झाली. हा मात्र गायक झाला. आर्थिक आघाडीवर यथातथाच राहिला. पण, तहानभूक हरपून गाताना तो केवढा देखणा दिसतो! पहिल्या भेटीत सगळ्यांनाच त्याच्या नव्या रुपाचा धक्का बसला. आता मात्र आमच्या ‘गेट टुगेदर’चा खरा ‘हीरो’ तो असतो! टॉपर असताना या ‘चष्मेबद्दू’ला कधीच हा सन्मान मिळाला नाही, जो त्याला आज मिळतो.

कोणाला काही त्रास होण्याचा, मदत हवी असण्याचा अवकाश, आमची सगळी फौज कोणत्याही मित्राला मदत करायला उभी असते. मैत्र हे असतं.

केशवसुत म्हणाले तेच खरं.

‘जग केवढं, ज्याच्या- त्याच्या डोक्याएवढं’ 

त्याचा पदाशी वा पगाराशी काही संबंध नाही. हे डोक रूंदावणं, मन विशाल करणं हेच गुपित आहे, तुमचं जग व्यापक करण्याचं. मग कळतं, जगण्यात मौज आहे. मुक्कामात नाही, प्रवासात गंमत आहे.

त्यासाठी आपलं जग तर बदलावं लागेलच, पण ‘माणूस’ म्हणून हा भवतालही बदलावा लागेल. आपली जगण्याची गोष्ट आहे, तशी प्रत्येकाच्या जगण्याची गोष्ट आहे. ती समजून घ्यावी लागेल. त्यासाठी कोणाच्या पश्चात नाही. त्याच्याशी थेट बोलावं लागेल. कोणाच्या शेतातला बांध जेसीबीनं उद्ध्वस्त करण्यापेक्षा या सीमा प्रश्नावर एकमेकांशी बोलावं लागेल.

“गैरों से कहा तुमने,

गैरों से सुना तुमने!

कभी हम से कहा होता,

कभी हम से सुना होता! “

हीच तर सल आहे.

तेव्हा, बोलू एकमेकांशी आणि मुख्य म्हणजे, एकमेकांशी बोलण्याचा अवकाश जिवंत ठेऊ. नाहीतर, सुशांतसारखे काही आत्महत्या करतील, उरलेले रोज मरत-मरत दिवस काढतील.

हे जग सुंदर करायचं असेल आणि ‘जगणेबल’ करायचं असेल, तर आधी छान निखळ माणूस व्हावं लागेल. माणसांची निरपेक्ष सोबत करावी लागेल. तुम्ही कोणावर प्रेम करता, तेव्हा तुम्ही स्वतःवरही प्रेम करायला शिकता. तुम्ही कोणावर विश्वास ठेवता, तेव्हा तुमचा स्वतःवरचा विश्वास अढळ होत जातो. तुम्ही कोणाशी बोलता, तेव्हा स्वतःशीच बोलत असता! आपल्यामुळं कुणाचा गेम झाला, यापेक्षा आपल्यामुळं कोणाच्या चेह-यावर हसू फुललं, याचा आनंद किती थोर असतो! हेच तर जिंकणं आहे!

मी आहे यार, कारण तू आहेस. आपण आहोत.

सोबत राहू, असेच.

जगू या, जिंकू या!

Love u All

 

लेखक : श्री संजय आवटे 

प्रस्तुती : श्री मोहन निमोणकर 

संपर्क – सिंहगडरोड, पुणे-५१ मो.  ८४४६३९५७१३.

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares
1

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ “राखीची गोष्ट…” ☆ श्री कौस्तुभ केळकर नगरवाला ☆

श्री कौस्तुभ केळकर नगरवाला

? मनमंजुषेतून ?

☆ राखीची गोष्ट☆ श्री कौस्तुभ केळकर नगरवाला ☆

सांगतो. जरा वेगळीये. म्हणूनच तर तुम्हाला सांगायचीय. महिनाभरापूर्वीची गोष्ट. लेकीच्या पाच सहा मैत्रिणी आल्या होत्या आमच्या दुकानात.. इंडियन आर्मीसाठी एखादी स्पेशल राखी आहे का हो तुमच्याकडे? त्यातल्या एकीनं विचारलं. मला कन्सेप्ट आवडली. मी लगेच सूरत ला आमच्या सप्लायरला काॅल लावला. त्यालाही कन्सेप्ट आवडली. तिरंगा, आर्मी टँक आणि स्टेनगनधारी वीर जवान असं डिझाईन असणारी तिरंगा राखी आलीये या वर्षी मार्केटमधे.. त्यावर ‘वीर जवान, देश की शान’ असं लिहलंय… लोकांनाही खूप पसंत पडत्येय ही राखी.

लेक खूप मागे लागलीये. तिच्या पाच सहा मैत्रिणींचा ग्रुप जायचाय तिकडे जैसलमेरला. खरं तर काजल राखी घेऊन जायचीये. तीच ती आर्मीवाली राखी. काजलचे आई बाबाही आहेत बरोबर. तिचे बाबा रिटायर्ड कर्नल कृष्णप्रकाश सिन्हा. आर्मीवालं घराणं आहे त्यांचं. प्रत्येक पिढीत एक तरी आर्मीत आहेच. ग्रेट.

तर काय सांगत होतो? परमिशन्स, रिझर्व्हेशन्स वगैरे सगळे सोपस्कार झालेत. माझाच धीर होत नव्हता. काल कर्नलसाहेबांचा फोन आला. “बच्ची की चिंता मत करो, हम है ना! “. मी कशाला नाही म्हणतोय…?

लेक खुष. लेक खुष तर तिचा बाबाही खुष.

आत्ता लेकीचा फोन आला होता. जाम एक्सायटेड होती.

ती काय म्हणाली ते ऐका.. “बाबा, आज सकाळी जेसलमेरला पोचलो. तिथून चाळीस किलोमीटरवर आहे ही चेकपोस्ट. इकडेतिकडे नुसतं वाळवंट. रणरणतं ऊन. चाळीसच्या वर टेम्परेचर. वाळूत रेघ मारावी तसलं तारांचं फेन्सींग. पलीकडे नापाक पाकिस्तान. तिथल्या प्रत्येक गोळीच्या टप्प्यात होतो आम्ही. मोस्ट थ्रिलींग. असं वाटलं स्टेनगन घ्यावी, धडधड फायर करावं आणि Let’s close the matter forever”

“280 किलोमीटरच्या आसपास पसरलेली बाॅर्डर आहे इथली. 150 च्या आसपास चेकपोस्ट. काही ठिकाणी दलदल, चिखल. दिवस, रात्र, ऊन, पाऊस नो एक्स्यूझ. 24×7 चा खरा इथं समजला. ऑलवेज ऑन ड्यूटी.

बाबा मोस्ट शाॅकींग… आम्ही राख्या घेवून गेलेलो. उडालोच. काजलचा भाऊ नाही मोठी बहीण होती तिथं. राखी नाव तिचं. तिच्यासारख्या अजून 399 होत्या तिथं. 400 जणींची बटालियन आहे ही. या बटालियनचं नावच कसलं भारीये. ‘सीमा भवानी’. आम्ही राखीताई आणि तिथल्या काही जणींना औक्षण केलं. राखी बांधली. मिठाई भरवली. दे वेयर व्हेरी हॅप्पी. दुर्गा होती प्रत्येक जण. मर्दानी. प्रहारी. पलीकडच्या बाजूला ओरडून सांगितलंय. ‘चड्डीत रहायचं, नाहीतर… ‘ बाबा, आयुष्यात विसरणार नाही आजचा दिवस… “

तासाभरानं मी कर्नलसाहेबांना फोन लावला. मनापासून थँक्स म्हणलं. ते गहिवरून बोलत होते.

’93 की बात है. कश्मीर में पोस्टींग थी हमारी. अनंतनाग के पास एक सर्च ऑपरेशन चालू था. पंडित के घर को अॅटॅक किया था, मिलिटंटस् ने. आधा घंटा फायरिंग चालू था. दो को मारा. दो भाग गये भौxxके. घर के अंदर घुसे तो सब खत्म हुआ था. पूरी फॅमीली लाल रंग की होली खेल चुकी थी. बेचारा बाप आखरी सास गिन रहा था. कपाट के अंदर तीन साल की बच्ची को छिपाया था. इसे संभालो’ बोल के 

वो बाप मर गया. मैं भी बाप हूँ. गोद ले लिया वो नन्हीसी परी को.. वही हमारी बडी बेटी राखी. ‘

शाॅक्ड मी होतो आता. राखीची गोष्ट. मी कधीच ऐकली नव्हती. जो रक्षण करतो तो भाऊ. आता रक्षण करणारी बहिण सुद्धा. राखीचा धागा किती स्ट्राँग आहे, ते समजलं आज. सीमेवरच्या एका तरी ‘जवाना’ला नाहीतर ‘सीमाभवानी’ला राखी पाठवायलाच हवी. वुई केअर, वुई रिस्पेक्ट, वुई सॅल्यूट. हा राखीचा धागाच देश बांधून ठेवतोय. सॅल्यूट इंडियन आर्मी. सलाम नमस्ते! येणाऱ्या 

रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा.

 

©  श्री कौस्तुभ केळकर नगरवाला

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ साठा उत्तराची कहाणी… ☆ उज्ज्वला केळकर ☆

उज्ज्वला केळकर

??

☆ साठा उत्तराची कहाणी☆ उज्ज्वला केळकर

श्रावणातला मनोहारी निसर्ग बघून बालकवी म्हणतात, ‘श्रावण मासी हर्ष मानसी. ’ श्रावणात, केवळ लेखक कवींनाच हर्ष होतो, असे नाही, तर जनसामान्यांच्याही मनात हर्ष दाटून येतो. त्याचं कारण, या महिन्यात अनेक सण, समारंभ, उत्सव येतात. रोजच्या दैनंदिन जीवनातील चाकोरीपेक्षा, काही वेगळं करताना, नवा उत्साह, नवचैतन्य, नवी उर्जा निर्माण होते.

माझ्या लहानपणी मी या सण-समारंभाच्या कहाण्या माझ्या आजीला वाचून दाखवायची. उदा. नागपंचमीची, दिव्याच्या आवसेची, जीवतीची, शीळासप्तमीची. याशिवाय प्रत्येक दिवसाची कहाणी असे. मला वाचायला त्या खूप आवडत. बाहेरच्या सारखे गूढ, अद्भूत वातावरण कहाणीत असे. त्या मनोरंजकही होत्या, तशाच बोधप्रदही असत. प्रत्येक कहाणीतील कथा वेगळी. त्यांची सुरुवात असे, एक आटपाट नगर होतं. तिथे एक गरीब ब्राह्मण. किंवा एक राजा होता. मग त्या कथेत एक वसा सांगितलेला असे. म्हणजे वागण्याचा नियम. वसा करणार्‍याला सुख मिळे. तो मोडणार्‍याला दु:ख, संकटे भोगावी लागत. आशा किती तरी कहाण्या. प्रत्येक कहाणीची कथा वेगळी, पण प्रत्येक कहाणीचा शेवट असे, ही साठा उत्तराची कहाणी. पाचा उत्तरी सुफळ सपूर्ण. कहाणी कोणतीही असो, तिचा शेवट याच वाक्याने होत असे.

त्यावेळी मी आजीला विचारायची, ही ‘साठा उत्तराची कहाणी. पाचा उत्तरी सुफळ सपूर्ण’ म्हणजे काय? तिला काही सांगता आले नाही. त्यानंतर मी मोठी होत गेले. खूप काही ऐकलं, वाचलं, पण ‘साठा उत्तरीचं कोडं काही सुटलं नाही. अनेक भाषेच्या अभ्यासकांना, विचारवंतांना, संशोधकांना विचारलं, पण मला काही समाधानकारक उत्तर मिळालं नाही.

शेवटी एक प्रयत्न म्हणून गुगल बाबाला विचारले. त्यांनी सांगितले, ‘साठा उत्तरी म्हणजे, साठ उतारे असलेली कहाणी म्हणजे कथा. ’. ती पाचा उत्तरी म्हणजे, ’ पाच उतार्‍यात सांगितली. ’ म्हणजे मोठ्ठी लांबलचक कहाणी, थोडक्यात… पाच उतार्‍यात सांगितली.

‘पाचा उत्तरी सुफळ सपूर्ण’ म्हणजे मोठ्ठी कहाणी ऐकून जे पुण्य, फळ लाभेल, ते, ही थोडक्यात सांगितलेली कहाणी ऐकूनही लाभेल. तोच तत्त्वबोध लहान कहाणी ऐकूनही होईल.

लोक हो, मला हे पटलं. तुम्हाला ते पटतय का, बघा!

 

© उज्ज्वला केळकर 

संपर्क – निलगिरी, सी-५ , बिल्डिंग नं २९, ०-३  सेक्टर – ५, सी. बी. डी. –  नवी मुंबई , पिन – ४००६१४ महाराष्ट्र

मो. 836 925 2454, email-id – kelkar1234@gmail.com 

≈ संस्थापक संपादक –  श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ प्राजक्त सडा… ☆ डॉ. नेहा भटकर ☆

डॉ. नेहा भटकर

? मनमंजुषेतून ?

☆ प्राजक्त सडा… ☆ डॉ. नेहा भटकर

परवा पहाटे अंगणातील पारिजातकाच्या हसऱ्या नाजूक फुलांचा सडा अंगणभर पसरलेला बघितला अन् पाय आपोआपच तिकडे वळले. मन उगाचचं या फुलांची नी आपली पहिली भेट नेमकी कधी झाली हे आठवायला लागलं तशी एक नवीनच गोष्ट ध्यानी आली. ती अशी की या फुलापानांच्या झाड झाडोऱ्याच्या रंगीबिरंगी दुनियेशी माझा परिचयच मुळी पारिजातामार्फत झाला. माझ्या आठवणीतील फुलांच्या परिचयाचा विचार करता, मला जितकं आठवतं, त्यानुसार अगदी पहिल्याप्रथम फुल म्हणून जे माझ्या समोर आलं ते पारिजातकाचचं फुल होतं. त्याआधी भलेही कितीतरी फुलं आणि झाडं बघितली असतीलही पण जाणिवेच्या स्तरावर झालेली प्रथम अनुभूती ही प्राजक्ताचीच. सरकारी नोकरीमध्ये असलेल्या माझ्या वडिलांच्या क्वार्टरच्या भल्यामोठ्या आवारवजा अंगणात अगदी दारासमोरची भली थोरली दोन पारिजाताची झाडं, श्रावण भाद्रपदात बहरली की प्रत्येक पहाट दूर दूर पर्यंत सुगंधी सुबक गर्द केशरी दांड्यांच्या चांदणंफुलांची उधळण करायची. त्या बालवयात कधी भिजलेली तर कधी कोरडी प्राजक्त फुलं एक एक करून अलगदपणे फ्रॉकच्या ओच्यामध्ये वेचता वेचता पहाट अपुरी पडे. अंमळ जराशाने जरी दिवस वर आला की त्या दिवसातली कोवळी सूर्यकिरणे सुद्धा प्राजक्त फुलांना सोसवेनात. या सगळ्या उद्योगात आवारातील अनेक जण असायचे. आमच्या चिमुकल्या हातातील सुवासिक हसऱ्या फुलांच्या ओंजळींच्या आठवणीने परवाची पहाट अधिकच प्रसन्न करून टाकली. तेव्हापासून मधली काही थोडी वर्षे शिक्षणानिमित्त घराबाहेर राहण्याचा काळ वगळता अगदी आजतागायत घराच्या अंगणात पारिजात माझ्या सोबतीला आहे. पारिजात आपल्या अंगणात नसला तरीही श्रावण भाद्रपदात दरवळणारा तो, कुण्या घराच्या आवाराच्या भिंतीवरून डोकावणाऱ्या डहाळीवरील शुभ्र नाजूक पाकळ्या आणि केशरी दांड्यांच्या मोहक इवल्या फुलांचा सडा रस्त्यावर जाता येता दिसला की क्षणभर तरी तिथे घुटमळायला लावणारा वा तिथून जाताना पावलांची गती तरी मंदावणारा, नकळत सुवासाच्या लालसेने एक दिर्घ श्वास घ्यायला लावणारा. असं हे त्याचं बहरणं, दरवळण आणि लागोलाग तो सुंदर सुवासिक फुलांचा खजिना सर्वत्र उधळूण, त्याच्या अस्तित्वाची नोंद घ्यायला भाग पाडणारं त्याचं वागणं.

हा जादुई पारिजात वृक्ष पूढे पुराणकथांमधून भेटला. समुद्रमंथनातून उपजलेला एक अलौकिक असा स्वर्गलोकीचा वृक्ष म्हणून त्याची ओळख. सत्यभामेच्या हट्टाखातर श्रीकृष्णाने मोठ्या पराक्रमाने इंद्राला पराजित करून भूलोकी आणलेला. या कथेचा संदर्भ घेऊन बालकवी त्यांच्या सुप्रसिद्ध ‘श्रावणमास’ कवितेत लिहितात ‘पारिजातही बघता भामा रोष मनीचा मावळला’ आणि या कवितेच्या निमीत्त्याने पारिजात पुन्हा आम्हाला क्रमिक पुस्तकाच्या पानावर एका वेगळ्या छापील रूपात व गंधात भेटला. आमच्या इयत्ता चौथीच्या शाळकरी वयात मराठी बालभारतीमधील बालकवींचा हा बहरलेला पारिजात आणि हर्षोल्हासित भामा वाचून फार आनंद व्हायचा. पण पुढे असे कळले की कसलं काय, सत्यभामेचा रोष पुन्हा उफाळून आला. ‘पारिजात माझ्या दारी, फुले का पडती शेजारी’ हे ‘बहरला पारिजात’ या नाटकातील ग. दि माडगूळकर यांनी रचलेलं आणि माणिक वर्मा यांनी गायलेलं हे नाट्यपद जेव्हा ऐकलं, तेव्हा कुठे भामेच्या रोषाचा उलगडा झाला. त्यायोगे पुन्हा एक पारिजात, त्याची आणखी एक खासियत आणि त्यासंबंधीची एक वेगळी पुराणकथा कळली. पारिजात सत्यभामेच्या दारी पण फुलांचा सडा शेजारच्या अंगणात अर्थात रुक्मिणीच्या. त्यामुळे भामेने मनाचा त्रागा करून घेणे हे ओघाने आलेच.

पुराणकथा आणि कवितांमधून बाहेर पडलेला पारिजात महाविद्यालयीन अभ्यासक्रमात पुन्हा एकदा त्याच्या शास्त्रीय आणि सौंदर्यपूर्ण तपशिलासह डोकावला. जागतिक स्तरावर विचार करता पारिजाताच घराणं हे मूळचं भारतीय उपखंड आणि दक्षिणपूर्व आशिया या भागातलं. भारतामध्ये तर हा सर्वदूर आढळणारा, अत्यंत देखणेपणाने फुलणारा, एकूणच शुभंकर म्हणून सर्वज्ञात. पारिजाताच शास्त्रीय नाव निक्टेन्थिस आर्बोर्ट्रिस्टिस’ (Nyctanthes arbor-tristis) म्हणजेच रात्री फुलणारा आणि पहाटेच्या अंधुक प्रकाशात सूर्योदयापूर्वीच फुलोराचं जमिनीवर शिंपण करणारा. जो रात्रीला असंख्य सुगंधी फुलांनी दरवळतो जणू काही आकाशातल्या शुभ्र चांदण्या आपल्या अंगाखांद्यावर केशरी कुपीतील सुगंधाचे लेणे लेवून मिरवतोय आणि उजाडायला लागलं की एक एक करून सगळी फुलं अलगदपणे जमिनीवर झरायला लागतात व संपूर्ण झाड पुन्हा पुढल्या रात्री फुलायला मोकळं. रात्रीला बहरणाऱ्या या झाडाला इंग्लिशमध्ये नाईट ब्लूमिंग जास्मिन (Night blooming Jasmine आणि उजाडायच्या आधीच फुलांच्या होणाऱ्या गळतीमुळे त्याला ट्री ऑफ सारो (Tree of sarrow), सागरी प्रवाळासारख्या केशरी मोहक दांडीमुळे त्याला कोरल जास्मिन (Coral Jasmine) असेही म्हणतात. इथे शास्त्रीय दृष्ट्या जस्मिन या शब्दाचा इतर अनेक जस्मिन कुळातील सुगंधी फुलझाडांचा दुरान्वयानेही संबंध नाही. विविध भारतीय भाषांमध्ये त्याची अनेक नावं आहेत जसे हिंदी व गुजराती मध्ये हरसिंगार, तमिळ मध्ये पवळा मल्लिगाई, मराठी मध्ये पारिजातक वा पारिजात, मल्याळममध्ये पारिजातकम, बंगाली व संस्कृतमध्ये शेफालीका वा शिऊली, प्राजक्त… वगैरे. पौराणिक कथांमध्ये स्वर्गलोकीचा वृक्ष म्हणून ओळखला जाणारा प्राजक्त, गंध आणि सौंदर्यामध्ये ज्याचं नाव अग्रक्रमाने घेतले जातं, औषधी शास्त्रातील त्याची महत्ता आणि उपयुक्तता सुद्धा जगनमान्य आहे. फुलांच्या गंध आणि रूप सौंदर्याशिवाय पारिजातक अनेक औषधी गुणधर्म देखील बाळगून आहे. आसाम आणि बंगालमध्ये पारिजात फुलांनी अनेक पाककृतींमध्येही प्रवेश केलायं आणि त्यांच्या खाद्य संस्कृतीचा भाग झालीत. फुलांच्या केशरी दांड्या बऱ्याचदा पदार्थाला रंग येण्यासाठी महागड्या केशरला पर्याय म्हणूनही वापरतात असेही ऐकिवात आहे. दांड्यांचा गर्द केशरी नैसर्गीक रंग हा तर आपल्या रेशमी कापड उद्योगात अगदी अग्रक्रमाने वापरला जातो. झाडावरून जमिनीवर पडलेलं फुल देवपूजेत नको हा संस्कार पण त्याला अपवाद आहे तो केवळ पारिजात फुलांचा, ती वेचायची त्यावर पाणी शिंपावे व खुशाल देवाला वाहायची.

आकोटजवळील सातपुड्याच्या पर्वतरांगांमध्ये वसलेल्या धारगडच्या निसर्गरम्य परिसरातील भटकंतीत असाच एकदा ध्यानीमनी नसताना, अगदी धारगडच्या महादेवाच्या गुंफेच्या खडकाळ डोंगर माथ्यावर उभा असलेला पारिजात, श्रावणात महादेवाला फुलांचा अभिषेक करीत असताना दिसला आणि कोण आनंद झाला हे शब्दात सांगणं कठीणच. हा वन्य परिसरात भेटलेला पारिजात न विसरणाजोगाच.

आज घडीचा हा अंगणात फुललेला पारिजात, काहीवर्षांपूर्वी मी नोकरीनिमित्ताने राहत असलेल्या माझ्या आकोटच्या घरातील पारिजाताच्या तिसऱ्या पिढीचा प्रतिनिधी. त्याचं झालं असं की आकोट येथील पारिजाताखाली उगवलेलं इवल्यासं रोपटं, आमच्या मित्र परिवारातील अमरावती निवासी कुटुंबाला भेटीदाखल दिलं. त्यांच्या अमरावतीच्या घरी त्याचा छान बहारदार वृक्ष झाला. पूढे जेव्हा आम्ही आमचं बिऱ्हाड आकोटहून अमरावती मुक्कामी हलवलं, तेव्हा त्यांनी त्याचं मैत्रीच्या नात्याने त्यांच्याकडील पुढल्या पिढीचा नवजात पारिजात आमच्या अंगणी लावायला आता पंधरा वर्षांहून जास्त काळ लोटला. कुठलेही फुलण्याचे निश्चित वेळापत्रक नसलेली, वर्षभरात केव्हाही ढगाळ दमट वातावरण जमून आले की लगेच पानोपानी पिवळसर पांढऱ्या हलक्या पोपटी छटेच्या असंख्य घमघमत्या सुगंधीत फुलांनी फुलून येणारी, स्वतःला डेरेदार करण्याच्या नादात चहुकडे विस्तारणारी कुंती वा कामिनी एकीकडे तर आकाशाशी स्पर्धा करणारा शेवगा दुसरीकडे, या दोघांच्या मध्ये माझ्या अंगणातील सध्याचा पारिजात, जमेल तसा अगदी निमूटपणे स्थिरावलाय. त्याची मुळी कुणाशीही स्पर्धा नाही.

जवळपास वर्षभर टपोऱ्या फुलांनी फुलणाऱ्या कोपऱ्यातील ऐटबाज चाफ्यासारखा तो डौलदारही नाही की कोवळ्या वा कडक उन्हाच्या तिरीपाचे कलाबूत लिलया अंगावर खेळवित चमचमणाऱ्या रुपेरी पानांनी भरारलेल्या समोरच्या सळसळत्या पिंपळासारखा देखणाही नाही. पारिजातकाकडे एरवी कुणाच्या कौतूकभरल्या नजरा वळणे तसे कठीणच. तो आपला वर्षभर निव्वळ खरखरीत पाने ओबडधोबड सालीच्या मातकट खोडानिशी ऊभा. जेव्हा दरवर्षी नित्यनेमाने श्रावण भाद्रपदातील दरेक रात्री त्याची फांदीनफांदी अगणित वेधक केशरी दांड्यांच्या नाजूक सुगंधित शुभ्र फुलांनी, जणू आकाशातील तारकाच, लगडून जाते तेव्हा हे स्वर्गीय सौंदर्य बघून अवघा भवताल नक्कीच चकित आणि पुलकित होत असणार यात शंका नाही. त्याला मात्र त्याच्या या अप्रतिम सौंदर्याचे काहीही नाही. ते विलक्षण सुवासिक, नाजूक आणि तितकंच रेखीव पांढऱ्या केशरी रंगाचं वैभव तो अंगावर मिरवीतही बसत नाही. अगदी पहिलं सूर्यकिरण अंगावर पडायच्या आत तो आपलं एक एक विलोभनिय सुगंधित आभूषण धरणीला अर्पण करायला लागतो, एक प्रकारचं अर्घ्य दानचं जणू. त्यासाठी तो वाऱ्याच्या हलक्याशा झुळकेची देखील वाट बघत नाही. फांदीवरून एकेक फुल गळताना बघणे, केवळ स्वर्गीय आनंद, त्यासाठी आपली पहाट मात्र मोकळी असायला हवी. बहुगुणी पारिजाताचं श्रावण भाद्रपदातील दरवळलेल दर्शन खरोखरीच विलोभनीय तर आहेच आणि आपसुकच त्याला बघून मनात दातृत्व, मांगल्य, शुचिता अशा भावनांचा उन्मेष उमटल्यास नवल ते काय. पारिजाताला मात्र सुंदर सुगंधी फुलांच्या ओंजळींची मुक्त्तहस्ते उधळण करणे एवढंच ठाऊक.

 ┉❀꧁꧂❀┉

©  डॉ. नेहा विनोद भटकर

अमरावती

मो ९९७५०३०६२७ 

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ एक मस्त आगळावेगळा अनुभव ☆ श्री सुधीर करंदीकर ☆

श्री सुधीर करंदीकर

? मनमंजुषेतून ?

☆ एक मस्त आगळावेगळा अनुभव ☆ श्री सुधीर करंदीकर

मी ड्रायव्हर सीटवर आणि शेजारी आरटीओ (पुण्याच्या रीजनल ट्रान्सपोर्ट ऑफिसचे मुख्य) असा प्रवास — सातारा ते पुणे”

शीर्षक जरा विश्वास न बसण्यासारखं नक्कीच वाटलं असेल. पण हा माझा एक खरा अनुभव आहे. त्याचं झालं असं —

साधारण 1990 ची घटना असेल. मी टेल्को कंपनी मध्ये (म्हणजे सध्याची टाटा मोटर्स) चिंचवडला फाउंड्री या विभागात सर्विस ला होतो.

मशीन ची दुरुस्ती हा विभाग माझ्याकडे होता. ट्रक ला लागणाऱ्या सगळ्या कास्टिंगचा पुरवठा आमच्या फाउंड्री मधून होत असे.

निरनिराळ्या कास्टिंगचे साचे तयार करण्याकरता परदेशातून आणलेली खूप मोठी मोल्डिंग मशीन होती. त्याच मशीन मध्ये एक अजस्त्र पार्ट होता त्याचे नाव होते Anvil.

काही वर्षांच्या वापरानंतर हा भाग वियर आऊट होतो आहे हे लक्षात आले. म्हणून जर्मनीहून नवीन पार्ट मागवण्यात आला. नवीन पार्ट मशीन मध्ये बसवला आणि जुना पार्ट रिपेयर होणार नाही या कल्पनेने स्क्रॅप यार्ड मध्ये नेऊन ठेवण्यात आला. याचे वजन साधारण चार टन होते, उंची साधारण आठ फूट आणि डायमीटर साधारण तीन फूट होता. अशा अजस्त्रेमुळे कोणी स्क्रॅप नेणारे पण त्याला नेत नव्हते.

साहेबांच्या असे लक्षात आले की हा पार्ट रिपेअर करून घ्यायला काय हरकत आहे. कारण आता पुन्हा नवीन पार्ट मागवायचा झाला तर त्याची किंमत साधारण 16 लाख रुपये आहे. जुना पार्ट रिपेअर करता आला तर बराच खर्च वाचू शकेल. साहेबांनी हे काम माझ्यावर सोपवले.

रिपेअर चे काम कसे करता येईल याचा मी आराखडा तयार केला. हे काम कुठे करून घेता येईल याची चौकशी सुरू केली. साताऱ्याजवळ सातारा रोड येथे भारत फोर्ज यांचे मोठे वर्कशॉप आहे, तिथे हे काम होऊ शकणार होते. तिथला सेटअप बघणे, त्यांना कामाची कल्पना देणे याकरता तिथे जाणे आवश्यक होते. मिटिंग मध्ये साहेबांनी लगेच याला ओके दिले. बाहेर गावी जायचे म्हणजे कंपनी टॅक्सी ची व्यवस्था करत असे. मटेरियल्स डिपार्टमेंटचे प्रमुख श्री के एस राव म्हणाले टॅक्सी च्या ऐवजी आपल्या ऑफिसची TATA 206 गाडी न्यायला हरकत नाही. साहेबांनी ओके दिला.

टेल्को नी 206 ही नवी गाडी नुकतीच लॉन्च केली होती. आणि एक नवी कोरी गाडी आमच्या डिव्हिजन ला मिळाली होती.

संध्याकाळी ऑफिस सुटल्यानंतर मी गाडीची किल्ली ताब्यात घेतली. आणि गाडी घेऊन घरी गेलो. दुसऱ्या दिवशी सकाळी साडेआठला घरून सातारा रोड कडे निघालो. कारच्या मानाने या गाडीची लांबी रुंदी बरीच जास्त आहे. गाडीचं समोरचं बोनेट खूपच लांब आहे, आणि ड्रायव्हर सीटवरून बोनेट चा काहीच भाग दिसत नाही. त्यामुळे समोरचा बंपर पण दिसत नाही. त्यामुळे गर्दीच्या रस्त्यावर गाडी चालवताना जरा मुश्किल होत होती.

भारत फोर्ज कंपनीत पोहोचलो. तिथे श्रीयुत रेड्डी प्रमुख होते. त्यांना भेटून कामाची कल्पना दिली. त्यांनी रिपेअर करण्याची एक वेगळी कल्पना समोर मांडली. ती मला जास्त आवडली म्हणून मी लगेच त्यांना त्याचे कोटेशन तयार करायला सांगितले. तिथला सेटअप बघितला आणि काम व्यवस्थित होऊ शकेल याची खात्री पटली. साधारण दोन लाखाचे कोटेशन होते. दुपारी जेवायला सातारा येथे गेलो होतो.

दुपारी चार वाजता साहेबांना बाय करून पुण्याकडे निघालो. काम छान होऊ शकते म्हणून खुशीत होतो. थोडे पुढे गेलो आणि सातारा-पुणे रोडला लागलो. काही अंतरावर डावीकडे ट्रॅफिक पोलीस च्या दोन गाड्या उभ्या होत्या. एक ऑफिसर उभे होते आणि दोन ट्राफिक पोलीस गाडी थांबवा असा हाताने इशारा करत होते.

मनात विचार आला — की माझ्याकडे ड्रायव्हिंग लायसन्स आहे पण बरोबर गाडी चे कुठलेही कागदपत्र नाहीत आणि माझे ऑफिसचे आय कार्ड पण नव्हते. मी मनातून देवाला नमस्कार केला आणि गाडी तिथे थांबवली. काच खाली केली आणि नमस्कार म्हणालो.

ट्रॅफिक पोलीस : साहेब गाडी कुठे चालली आहे

मी : पुण्याला

ट्रॅफिक पोलीस : आरटीओ साहेबांना बरोबर नेणार का. साहेबांची गाडी बंद पडली आहे.

मी : नक्कीच घेऊन जाईन.

लगेचच बाजुच्या दारातून साहेब आत आले. पोलिसांनी दार बंद केले आणि साहेबांना जोरदार सॅल्यूट ठोकला. आणि आमची गाडी पुण्याकडे निघाली. गाडीत साहेबांबरोबर छान गप्पा झाल्या. आपल्या गाडीत बाजूला खुद्द आरटीओ बसले आहेत आणि आपण गाडी चालवत आहोत याची मला मजा वाटत होती.

पुण्यात शिरल्यानंतर लागणाऱ्या चौकांमध्ये आमची गाडी बघून पोलीस सॅल्यूट करत होते. साहेब म्हणाले निलायम टॉकीज पाशी गाडी थांबवा तिथे मला नेण्याकरता गाडी आली आहे. मी गाडी साईडला उभी केली. तिथे पोलिस उभे होतेच. त्यांनी साहेबांना सॅल्यूट केला आणि दार उघडले. साहेबांनी उतरतांना मला थँक्स दिले आणि मी गाडी छान चालवतो याबद्दल कॉम्प्लिमेंटस् पण दिले.

मी गाडी सुरु केली आणि घराकडे निघालो.

माझे साताऱ्याचे कामं छान झाले होते, आणि ते काम व्यवस्थित पूर्ण होणार अशी खात्री पण मनात तयार झाली होती. आणि येताना आरटीओ बरोबर प्रवास करण्याची अशक्यप्राय म्हणा किंवा दुर्मिळ म्हणा, अशी संधी पण मिळाली होती. एकंदरीत मजा आली.

– – life is to enjoy.

 © श्री सुधीर करंदीकर

मो. 9225631100 – ईमेल – srkarandikar@gmail. com

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ “काल देव पुन्हा भेटला.. ” – लेखक : श्री सुबोध गाडगीळ ☆ प्रस्तुती – मंजुषा सुनीत मुळे ☆

मंजुषा सुनीत मुळे

??

☆ “काल देव पुन्हा भेटला.. ” – लेखक : श्री सुबोध गाडगीळ  ☆ प्रस्तुती – मंजुषा सुनीत मुळे ☆

मी म्हटलं, “हल्ली जरा जास्तच भेटतोयस. ”

“तुझं वय बघता networking वाढवून ठेवलेलं बरं, ” तो म्हणाला.

“काहीतरीच काय! ”

“मग तूच सांग. तुमच्याकडे पन्नाशीच्या पुढे डॉक्टर, CA आणि देव या तिघांशी संबंध चांगले ठेवायला सुरुवात होते की नाही? ”

मी हसलो.

देव आज चांगल्या mood मध्ये दिसत होता.

मी सहज विचारलं, “एक सांग. माझ्या आयुष्याचा हिशोब तुझ्याकडे असतो का? ”

“असतो. ”

“सगळा? ”

“सगळा. ”

“म्हणजे मी काय कमावलं, काय खर्च केलं, कुठे गेलो, काय केलं…? ”

“नाही रे. एवढा फालतू data ठेवायला माझ्याकडे server space नाही. ”

मी चमकलो.

“मग कसला हिशोब? ”

तो काही बोलला नाही.

मीच पुढे म्हणालो, “मला वाटलं असेल काहीतरी मोठं account. पुण्य किती, पाप किती… शेवटी net balance. ”

“तुम्ही माणसं ना, मला फार कमी लेखता. मला CA समजता की चित्रगुप्ताचा junior? ”

“मग काय नोंदवतोस? ”

“उदाहरण देतो. परवा तू एका माणसाला फोन केला होतास. ”

“कुठल्या? ”

“ज्याच्याकडून तुला काही काम नव्हतं. ”

मी आठवायचा प्रयत्न केला.

“अच्छा! सहज केला होता. ”

“माझ्याकडे तो सहज नव्हता. ”

“म्हणजे? ”

“त्याचा दिवस खराब गेला होता. तुझ्या दहा मिनिटांच्या फोनने जरा बरा झाला. ”

मी काही बोललो नाही.

“आणखी एक. काही दिवसांपूर्वी घरी सगळे बसले होते आणि तुम्ही कसल्यातरी फालतू विषयावर पोट धरून हसलात. ”

“त्याचीही entry? ”

“मोठी. ”

“आणि मी केलेली महत्त्वाची कामं? ”

“कुठली? ”

“इतकी वर्षं काम केलं, व्यवसाय उभा केला, पैसे कमावले, जबाबदाऱ्या पार पाडल्या… ”

देवाने माझ्याकडे विचित्र नजरेने पाहिलं.

“त्यासाठी तुला पैसे मिळाले ना? ”

“हो. ”

“मग त्याचं credit पुन्हा माझ्याकडे कशाला मागतोयस? ”

हा मुद्दा मला आवडला नाही.

“म्हणजे achievements ना काही किंमतच नाही? ”

“आहे ना. भरपूर आहे. पण गंमत अशी आहे की तुम्ही ज्या गोष्टींचा हिशोब आयुष्यभर ठेवता, त्यांचा मला फारसा ठेवावा लागत नाही. आणि ज्या गोष्टी तुम्ही कुठेच नोंदवत नाही, त्या मला जपून ठेवाव्या लागतात. ”

आता मी शांत झालो.

“उदाहरणार्थ? ”

“तुझ्यामुळे कोणाचा अपमान टळला. कोणाला गरज असताना तू थांबलास. कोणाचं पूर्ण ऐकून घेतलंस. स्वतः बरोबर असूनही एखादा वाद वाढवला नाहीस. कुणाच्या आनंदात मनापासून आनंदी झालास. एखाद्या माणसाला त्याच्या कठीण काळात ‘मी आहे’ एवढंच सांगितलंस. ”

मी म्हणालो, “पण यापैकी बरंचसं मला स्वतःलाही आठवत नसेल. ”

“म्हणून तर मी लिहून ठेवतो! ”

त्याच्या चेहऱ्यावर पुन्हा तेच खोडकर हसू आलं.

मला अचानक एक शंका आली.

“पण मग चुका? त्या पण लिहितोस? ”

“नक्की. ”

“किती आहेत? ”

“तुला उद्या काही काम नाही ना? ”

“एवढ्या? ”

“अरे, मी देव आहे. जादूगार नाही. ”

मी हसलो.

थोड्या वेळाने विचारलं,

“मग शेवटी माझ्या खात्यात काय उरेल? ”

तो म्हणाला,

“हीच तुमची अडचण आहे. प्रत्येक नातं, प्रत्येक काम, अगदी आयुष्यसुद्धा तुम्हाला शेवटी profit की loss एवढ्यात काढायचं असतं. ”

“मग हिशोब कशासाठी? ”

देव काही क्षण शांत राहिला.

“हिशोब तुला न्यायला नाही रे. तुला कधीतरी दाखवायला. ”

“काय? ”

“तू आयुष्यभर ज्या गोष्टींना मोठं समजत होतास, त्यातल्या बऱ्याच गोष्टी किती लहान होत्या आणि ज्या क्षणांना ‘यात काय विशेष? ’ म्हणून विसरून गेलास, तेच प्रत्यक्षात किती मोठे होते. ”

तो उठून निघाला. मी मागून विचारलं,

“मग आत्तापासून काय करू? ”

त्याने मागे न बघताच उत्तर दिलं,

…. “काही वेगळं करू नकोस. नाहीतर उद्यापासून प्रत्येकाला मदत करून मनात म्हणशील — ‘देवा, entry केलीस ना? ’”

मी जोरात हसलो.

तो थोडा पुढे गेला आणि थांबला.

“फक्त एक गोष्ट कर. ”

“काय? ”

“तुझ्या आयुष्यात ज्या गोष्टींची पावती मिळत नाही, त्यांना कमी किंमत देऊ नकोस. ”

आणि तो निघून गेला.

आपल्याला पगाराची slip मिळते. Investment चं statement मिळतं. धावण्याला वेळ मिळतो. कामाला appraisal मिळतं. घराला market value मिळते. Social media वर likes मिळतात.

म्हणून त्या गोष्टी खऱ्या वाटतात.

पण आईबरोबर निवांत बसलेली दहा मिनिटं, जुन्या मित्राचा विनाकारण आलेला फोन, मुलांबरोबर झालेलं फालतू हसणं, कोणीतरी अडचणीत असताना आपण न बोलता त्याच्या बाजूला उभं राहणं, यापैकी कशाचीही receipt मिळत नाही.

त्यामुळे बहुधा आपण त्यांचा हिशोबच ठेवत नाही आणि कदाचित आयुष्याची सगळ्यात मोठी गंमत हीच आहे, ज्याचा आपण काटेकोर हिशोब ठेवतो, ते शेवटी इथेच राहून जातं.

आणि ज्याचा कधी हिशोबच ठेवला नाही, तेच बहुधा आपल्याबरोबर येतं.

लेखक : श्री सुबोध गाडगीळ

प्रस्तुती – मंजुषा सुनीत मुळे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ वाळवंटातील हिरवळ ☆ श्री विश्वास देशपांडे ☆

श्री विश्वास देशपांडे

??

☆ वाळवंटातील हिरवळ ☆ श्री विश्वास देशपांडे ☆

बऱ्याच ठिकाणी लग्नानंतर स्वागत समारंभाचे आयोजन केले जाते. हल्ली त्यासाठी ‘ रिसेप्शन ‘हा इंग्रजी शब्द मोठ्या प्रमाणावर प्रचलित आहे. कधी कोणाचा गौरव सोहळा असतो तर कधी कोणाची एकसष्ठी किंवा एकाहत्तरी किंवा सहस्रचंद्र दर्शनाचा कार्यक्रम अशा विविध कारणांनी असे कार्यक्रम आयोजित केले जातात. अशा कार्यक्रमांना आपण हजेरी लावतो. कार्यक्रम पत्रिकेत उपस्थित राहून आपण कार्यक्रमाची शोभा वाढवावी आणि स्नेहभोजनाचा लाभ घ्यावा असे आवाहन केलेले असते. हे स्नेहभोजन म्हणजे बऱ्याच वेळा बुफे असते.

‘ कार्यक्रमास उपस्थित राहून शोभा वाढवावी ‘ असे आवाहन केलेले असल्यामुळे सर्वजण उत्तम प्रकारचा पोशाख घालून अंगावर सुगंधी द्रव्य फवारून अशा कार्यक्रमांना जाऊन खरोखरीच त्यांची शोभा वाढवत असतात. बऱ्याच वेळेला असे कार्यक्रम म्हणजे फॅशन शो सारखे वाटतात. या कार्यक्रमांमध्ये काही ओळखीची बरीच मंडळी भेटते. एखाद्या लांबट टेबलवर पांढरे स्वच्छ आच्छादन घालून निरनिराळे खाद्यपदार्थ आकर्षक पद्धतीने मांडून ठेवलेले असतात. बाजूलाच नव्या कोऱ्या डिश असतात. जणू काही त्या कार्यक्रमासाठी नवीनच आणलेल्या! प्रत्येक डिशवर पेपर नॅपकीन असतो. मंडळी रांगेत उभे राहून आपल्या हाताने आपल्याला हवे ते पदार्थ घेत असतात.

वधू-वरांना किंवा सत्कारमूर्तींना स्टेजवर जाऊन भेटवस्तू द्यायची, शुभेच्छा द्यायच्या आणि यजमानांचा निरोप घेऊन मार्गस्थ व्हायचे असा साधारण हा प्रकार असतो. यजमान बिचारे मनापासून अशा कार्यक्रमांचे आयोजन करत असतात. त्यासाठी आपला वेळ, पैसा आणि श्रम खर्च करत असतात. आपण कार्यक्रमासाठी यावे आणि शुभेच्छा किंवा शुभाशीर्वाद द्यावेत असा त्यांचा प्रामाणिक हेतू असतो. आणि तो मोठ्या प्रमाणावर साध्य होतानाही दिसतो. परंतु अलीकडे अशा कार्यक्रमांमध्ये त्यांची सहजता जाऊन आणि मूळ उद्देश बाजूला पडून औपचारिकता आलेली दिसते.

खरंतर असे कार्यक्रम म्हणजे सामाजिक जीवनातील एक सुंदर प्रसंग! यानिमित्ताने समाजाच्या विविध स्तरातील लोक एकत्र येत असतात. प्रत्येक जण नेहमी आपापल्या कामात व्यस्त असल्यामुळे इच्छा असूनही मित्रांच्या, नातेवाईकांच्या किंवा ओळखीच्या लोकांच्या भेटी होत नाहीत किंवा त्यांच्याकडे जाण्यासाठी वेळ मिळत नाही. परंतु अशा प्रकारचे कार्यक्रम आपल्याला आपल्या ओळखीच्या व्यक्तींना भेटण्याची संधी उपलब्ध करून देत असतात. त्यामुळे अशा व्यक्तींकडे जाण्यासाठी जो वेळ आपल्याला द्यावा लागला असता तो वेळ वाचतो आणि त्यांच्याशी अनौपचारिक गप्पागोष्टी करण्याची संधी अनायासे उपलब्ध होते. परंतु किती जण या प्रसंगाचा असा लाभ घेतात?

अशा कार्यक्रमात आपल्या ओळखीची व्यक्ती दिसली की आपण आपला हात उंचावून त्यांना अभिवादन करतो किंवा हाय हॅलो म्हणतो. चेहऱ्यावर एखादी स्मितरेषा असते. फार तर ” काय? कसे आहात? खूप दिवसांनी भेटला ” या पलीकडे संभाषणाची गाडी पुढे जात नाही. असा औपचारिक संवाद होऊन जो तो आपापल्या उद्योगात (म्हणजे येथे जेवण्याच्या किंवा शुभेच्छा देण्याच्या कार्यक्रमात) मग्न होऊन जातो.

अशा प्रसंगी समाजाच्या विविध स्तरातील लोक एकत्र आलेले असतात. परंतु आपण सर्वांशी संवाद साधत नाही. आपल्या ओळखीचे, आपल्या बरोबरीचे, आपल्या सामाजिक स्तराला शोभतील अशा प्रकारच्या व्यक्तींशीच आपण फार तर थोडे हितगुज करतो. या कार्यक्रमात असेही काही लोक आलेले असतात की ज्यांचा सामाजिक स्तर किंवा प्रतिष्ठा आपल्यापेक्षा कमी असते. अशा लोकांना आपल्याशी बोलावेसे वाटते परंतु अशावेळी आपली प्रतिष्ठा किंवा अहंकार आडवा येतो आणि आपण त्यांच्याशी बोलणे टाळतो काही लोक तर अशाप्रसंगी ओळखही दाखवत नाहीत. आयोजकांनी आवाहन केल्याप्रमाणे आपण खरोखरच कार्यक्रमाची फक्त शोभा वाढवण्यासाठी येतो आणि एखाद्या शोभेच्या वस्तूसारखेच येतो आणि जातो.

पण खरं तर असे कार्यक्रम म्हणजे लोकांशी संबंध दृढ करण्याची मोठी संधी असते असे मला वाटते. आजच्या काळात जसे आपण अनेक गोष्टींचे रिन्यूअल करतो तसेच संबंधांचे देखील रिन्यूअल करण्याची ही संधी असते. आपल्या मित्रमंडळींची, नातेवाईकांची आस्थेने विचारपूस करावी, त्यांची सुखदुःखे जाणून घ्यावी यासाठी हे कार्यक्रम अनायासे संधी उपलब्ध करून देतात. पण औपचारिकता, कृत्रिमता, अभिमान, अहंकार, खोट्या प्रतिष्ठेच्या कल्पना यासारख्या गोष्टींमुळे आपण अशा प्रकारची चांगली संधी अशा कार्यक्रमांमधून दवडतो.

पण अशाही प्रसंगात प्रेमाने विचारपूस करणारे, आस्थेने चौकशी करणारे काही लोक भेटतात. असे लोक मला वाळवंटातील हिरवळीसारखे वाटतात. त्यांच्याजवळ कृत्रिमता नसते. अभिमान किंवा अहंकार नसतो किंवा खोट्या प्रतिष्ठेच्या कल्पनाही नसतात. अशी माणसे प्रेमाचे किंवा शीतलतेचे गुलाबपाणी प्रत्येकाच्या अंगावर शिंपत असतात. अशी माझ्या ओळखीची काही माणसे आहेत. ती भेटली म्हणजे जवळ येऊन आवर्जून बोलणारच! कधी कधी त्यांच्या पिशवीत गुलाबपुष्पे किंवा चाफ्याची फुले असतात. आपल्या ओळखीच्या व्यक्तींना ही फुले देऊन आपुलकीच्या सुगंधाची देवाण-घेवाण करतात. काहीजण जवळ येऊन अकृत्रिम हस्तांदोलन करतात किंवा गळाभेट घेतात. यातूनही संबंध दृढ होतात अशा व्यक्तींबद्दलची आपुलकी, प्रेम वाढीस लागते. अशी माणसे संकटप्रसंगी धावून येतात, मदतीला नेहमीच तयार असतात. अशी माणसे म्हणजे समाजरूपी उपवनात फुललेली सुंदर फुलेच! वाळवंटात सगळीकडे वाळूच वाळू पसरलेली असते आणि रखरखीत वातावरण असते. अशा वातावरणात कुठे अपवादाने हिरवळ दिसली की मन प्रसन्न होते. अशीच ही माणसे वाळवंटातील हिरवळ!

© श्री विश्वास देशपांडे

चाळीसगाव

प्रतिक्रियेसाठी ९४०३७४९९३२

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ कापणे – एक इव्हेंट! ☆ श्री प्रमोद वामन वर्तक ☆

श्री प्रमोद वामन वर्तक  

? मनमंजुषेतून ?

☆ कापणे – एक इव्हेंट! ☆ श्री प्रमोद वामन वर्तक ☆

माझ्या समवयस्क पिढीतील लोकांना लहानपणी हातात पडलेल्या पहिल्या “शिस पेन्सिलीच” त्याकाळी, त्या वयात काय अप्रूप होतं ते नक्कीच आठवत असेल! मला आज बहात्तरीत आठवतंय त्याप्रमाणे तेंव्हा मराठी चौथीपर्यंत काळीशार दगडी पाटी आणि चुन्याची पांढरी षटकोनी किंवा चौकोनी पेन्सिल, यावरच ‘लिहित्या हाताच्या’ बोटांना आम्हां मुलांना समाधान मानावं लागत असे! या वाक्यातील ‘लिहित्या हाताच्या’ या माझ्या शब्दप्रयोगावर आपली वाचनाची गाडी अडखळली असेल, तर त्याबद्दल आपलं समाधान होईल असा खुलासा आधी करतो, म्हणजे मग तुम्ही पुढचा लेख वाचायला आणि मी पुढे लिहायला मोकळा!

आपण म्हणालं आता हे काय तुमच नवीनच? “लिहिता हात” म्हणजे काय? तर त्याच कसं आहे मंडळी, जसं काही काही लोकं बोलतांना “खाता हात” आणि “धुता हात” असे शब्दप्रयोग करतात, तसा मी “लिहिता हात” असा शब्दप्रयोग केला तर कुठे बिघडलं? कारण आपल्यापैकी बरेच जण डावरे (का डावखुरे? ) असण्याची शक्यता गृहीत धरूनच मी या नवीन हाताचा “शोध” सॉरी, नवीन शब्दप्रयोगाचा शोध लावलाय! दुसरं असं की समस्त डावऱ्यां मंडळींकडून, मी माझ्या सारख्या उजव्यांना उजवं माप देतोय, असा बिनबुडाचा आरोप कशाला ऐकून घेवू? काय बरोबर ना मंडळी?

हां, तर काय सांगत होतो मंडळी, हातात आलेल्या पहिल्या शिस पेन्सिलीच अप्रूप! तर अशी ही शिस पेन्सिल आपल्या स्वतःच्या मालकीची म्हणून पाचवीत हाती येई पर्यंत, जर आपण कुतूहलापोटी आपल्या ताई किंवा दादाच्या शिस पेन्सिलीला नुसता हात जरी लावला असेल, तरी आपण तिचा किंवा त्याचा ओरडा त्याकाळी नक्कीच खाल्ला असेल. शिवाय एखाद्याचा दादा किंवा ताई जास्तच रागीष्ट असेल तर? त्या ओरडयाबरोबर त्याची किंवा तिच्या हातची चापटपोळी. आपण म्हणालं, हे सगळं जरी काही प्रमाणात खरं असलं, तरी या सगळ्याचा आणि आजच्या लेखाच्या शीर्षकाचा संबंध काय? सांगतो, सांगतो मंडळी, जरा सबुरीन घ्या!

तर पाचवीत पहिल्यांदाच हाती आलेल्या नव्या कोऱ्या “शिस पेन्सिलीला” टोक काढायला, त्याकाळी आजची “शार्प” लहान मुलांची पिढी जे “शार्पनर” वापरते, त्याचा शोध बहुतेक लागायचा होता म्हणा किंवा माझ्या सारख्या मध्यमवर्गातल्या मुलांना त्याकाळी ते विकत घेणं परवडत नव्हतं म्हणा, पण तेव्हा आम्ही मुलं शिस पेन्सिलीला टोक काढण्यासाठी एखाद जुनं अर्ध “भारत ब्लेड” वापरत असू. पण मंडळी, त्या शिस पेन्सिलीला अर्ध्या ब्लेडने टोक काढता काढता, पेन्सिलीतून तीच टोक बाहेर येण्या आधीच हाताच्या एखाद्या बोटातून हमखास लाल भडक रक्त बाहेर येई. मग काय, अशावेळी माझी जी काय रडारड सुरु व्हायची त्याला तोड नसायची! कारण त्या वयात असं एखाद “कठीण” काम, स्वतःच स्वतः अभिमानाने करतांना, आपल्याच हातून आपल्याच चुकीमुळे बोटातून रक्त आलेला, बहुदा तो आयुष्यातला पहिलाच प्रसंग असायचा. मग हे सगळं आईला कळताच तिची बोलणी खात खात, कधी कधी त्या सोबत तिच्या हातचे धपाटे तोंडीलावण्यासारखे खाता खाता, तिने आठवणीने बरोबर आणलेला मातकट रंगाचा “रामबाण कापूस” ती मला बोटावर झालेल्या माझ्या जखमेवर लावी. तो लावता लावता तोंडाने, “साधी एका शिस पेन्सिलला टोक काढता येत नाही आणि म्हणे मला पेन्सिलचा अख्खा नवीन बॉक्स हवाय! टोक काढतांना गाढवासारखं (? ) स्वतःच बोट कापून घेतलंस, तरी त्या नावाखाली आज तुझी अभ्यासातून मुळीच सुटका नाही, कळलं? बस अभ्यासाला! “

मंडळी, तेंव्हा जरी साने गुरुजींची “श्यामची आई” त्याकाळच्या आयांच्या कितीही आवडीची असली, तरी सगळ्याच मुलांच्या आया काही “श्यामच्या आईसारख्या” आपापल्या मुलांशी वागत नव्हत्या नां! त्यामुळे माझ्या आईच्या तोंडातल्या वरच्या डायलॉगचा शेवट, माझ्या शरीराचा कुठला तरी अवयव त्यातल्या त्यात तिच्या उजव्या हाताच्या जवळच्या टप्प्यात असेल, त्यावर त्याच हाताची एक सणसणीत बसूनच होत असे!

मंडळी, त्या औषधी “रामबाण कापसाची” एक खासियत होती. तो नुसता जखमेवर दाबून धरताच एका क्षणात जखमेतून येणार रक्त, रेड सिग्नल मिळाल्यावर पूर्वी जशा गाड्या थांबत तसं थांबत असे! हल्ली रेड सिग्नल आणि त्याच्या जोडीला पोलिसाचा आडवा हात व त्याच्या जोडीला त्याच्या तोंडातली शिट्टी, याला सुद्धा कोणी जुमानत नाही हा भाग निराळा. दुसरं असं की आजच्या सारखा तो काही “वॉटरप्रूफ बँडेडचा” जमाना नव्हता. त्यामुळे औषधी “रामबाण कापसाच्या” फर्स्टएडवरच अशा जखमांची तेंव्हा बोळवण केली जायची. अशी “रामबाण कापसाची” त्या काळातली फर्स्टएड मलमपट्टी आपण सुद्धा कधीतरी अनुभवली असेल! आजकाल कशातच “राम” उरला नाही, मग हा “रामबाण कापूस” तरी कसा उरेल, खरं की नाही? असो! कालाय तस्मै नमः!

तेंव्हा आजच्या सारखी गल्ली बोळात उगवलेली, वेगवेगळ्या हेअर स्टाईल करणारी महागडी एसी “सलोन” तर सोडाच, पण साधी “शंकर केश कर्तनालय” सारखी “सलून” सुद्धा शहरातल्या ठराविक उच्चभ्रू वस्तीत हाताच्या बोटावर मोजण्या इतकी सुद्धा नव्हती! आणि त्यावेळेस ती असली काय किंवा नसली काय, तेंव्हा त्याची पायरी चढून स्वतःच डोकं भादरण चाळीतल्या कोणालाच त्या वेळेस तरी परवडण्यासारखं नव्हतं! किंबहुना त्या सलूनमधे जाऊन एका वेळच्या डोकं भादरायच्या खर्चात, “भावजा” नामक आमच्या आठ चाळीच्या संकुलचा एकच नाभिक असलेल्या नाभिकपुढे पुढे अख्खी दोन वर्ष नतमस्तक होता आलं असतं, असा साधा सरळसोट मध्यमवर्गीय हिशेब त्यात होता, हे ही तितकंच खरं! त्यामुळे “भावजाच्या” सकाळच्या सातच्या अपॉइंटमेंटसाठी चाळकऱ्यांना दहा दहा वाजेपर्यंत वाट पहात बसण्याशिवाय पर्याय नसायचा. कधी कधी त्याला जास्तच उशीर झाला, तर घरातली वडील मंडळी आम्हां पोरांना त्याची स्वारी कुठल्या चाळीत आपल्या हातातलं कसब दाखवत बसली आहे, याचा शोध घेण्यासाठी पाठवत असे. आता मी जरी “भावजाच्या” केस कापण्याला त्याच्या हातातलं कसब म्हटलं, तरी तेंव्हा बहुतेक “क्रू कटचा” शोध त्याच्याच “मशीन” मधूनच जन्माला आला असावा, असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. पुढे आमच्या या “भावजाचा” तो “क्रू कट” त्यावेळच्या पोलीस शिपायांच्या माथी जाण्यामागे आमच्या “भावजाचाच” तर हात नाही ना? इतपत शंका घेण्यास काही चाळकऱ्यांची मजल तेंव्हा गेली होती.

केस कापायला आपल्यापुढे कोण बसलंय, त्याच वय काय, त्याला कसे केस कापून हवेत अशा क्षुल्लक गोष्टींची चर्चा न करता, समोरच्या व्यक्तीच डोकं आपल्यापुढे त्याची मान दुखेपर्यंत जास्तीत जास्त वाकवून, दिसला केस काप करत, तो डोक्यावरील केसांची “कतले आम” त्याच्या पद्धतीने करत सुटे! या त्याच्या केस कापण्याच्या स्वतःच्या स्टाईलमुळे एखाद्या सोमवारी, आठ चाळीतल्या समस्त आयांचा आपापली मुलं मागच्या बाजूने ओळखण्यात फारच गोंधळ उडे मंडळी. कारण केस कापल्यावर सगळी मुलं मागून थोडे दिवस तरी सारखीच दिसायची! मग काही कारणाने एखाद्या मुलाला दुसऱ्याच आईचा फटका खायचा प्रसंग सुद्धा ओढवायचा!

त्या जमान्यात हिंदी सिनेमे पाहण्यापेक्षा लोकं मराठी संगीत नाटकं पहाणं जास्त पसंत करीत असतं. त्यामुळे हिंदी सिनेमांतल्या एखाद्या “कुमारा” सारखी आपण पण हेअरस्टाईल करावी असं कोणाला वाटत नसे. शिवाय तशी फॅशन पण तेंव्हाच्या तरुण मंडळीत फोफावली नव्हती आणि मराठी संगीत नाटकातल्या एखाद्या कळलाव्या नारदा सारखी हेअरस्टाईल (? ) करायचा तर प्रश्नच नव्हता. कारण डोक्यावरच जंगल कंगव्याने केस फिरवण्या इतकं वाढलं रे वाढलं, की लगेच “भावजाला” फर्मान जाई!

आज वयाच्या बहात्तरीत “डोक्याने” किंवा “डोक्याची” अनेक कामं करून म्हणा, अथवा अनूवांशीक जीन्समुळे म्हणा, आजमितीस मानेवर जी काय पांढऱ्या केसांची तुरळक झालर उरल्ये, ती वाढल्यावर कापायला सटी सामाशी “सलूनमधे” जायचा योग येतो, तोच काय तो! पण आता पूर्वीसारखी “भावजा” समोर लहानपणी जशी मान तुकवावी लागत असे, तशी आता सलूनमध्ये तुकवावी लागत नाही, हेच काय ते त्यातल्या त्यात मनाला समाधान! फक्त या बाबत एकच तक्रार मी मनातल्या मनांत स्वतःलाच करत असतो मंडळी. माझ्या मानेवरची केसांची पांढरी तुरळक झालर कापायलासुद्धा, एखाद्याच्या डोक्यावरील संपूर्ण जंगल कापण्या इतकेच पैसे द्यावे लागतात! त्यामुळे वेगळ्या अर्थाने आपलं पाकीट किंवा खिसा कापला जातोय, याच नाही म्हटलं तरी माझ्या सारख्या पेन्शनराला आत कुठेतरी दुःख होतच होतं!

केस कापण्यावरून आठवलं, साधारण तीस पस्तीस वर्षापूर्वी ट्रेनच्या किंवा बेस्ट बसच्या प्रवासात ज्याच पाकीट किंवा खिसा कापला गेला नाही, असा चाकरमानी मिळणं विरळाच! आणि कोणी फुशारकीने तसं म्हटलं तर त्याने त्यावेळच्या ट्रेनच्या “थर्ड क्लासने” गर्दीच्या वेळेस डोंबिवली किंवा विरार लोकलमधून, संध्याकाळच्या रश अवर मधे प्रवास केलेलाच नसावा, हे तुम्ही त्याला खात्रीपूर्वक सांगू शकता.

त्यावेळच्या ट्रेनमधल्या खिसा कापण्याच्या एक एक चमत्कारिक आणि सुरस कथा आज नुसत्या आठवल्या तरी खूपच मनोरंजन होतं. सध्या पाकीट आणि खिसा कापणाऱ्या टोळ्या अस्तित्वात आहेत की नाहीत, अशी शंका घेण्या इतपत सध्याची परिस्थिती आहे. कारण आत्ताच्या कलियुगी अशा चिल्लर चोऱ्या करण्यापेक्षा, आजकाल सगळ्यांनाच स्वतःच्या जिवापेक्षा प्यारा झालेल्या एखाद्या महागड्या “मोबाईलची” चोरी करण्यावर सांप्रत काळातील चोरांच्या नवीन पिढीने आपला मोर्चा वळवला आहे, हे आपण सुद्धा मान्य कराल. त्यामुळे पुन्हा एकदा मी “कालाय तस्मै नमः” म्हटलं, तर आपल्याला त्यात वावगं वाटणार नाही अशी आशा करतो!

एखाद्या वास्तूच उदघाटन त्याच्या दाराला लावलेल्या आडव्या “लाल फीतीला” कापून, कोणा मान्यवरच्या हाती करायची पद्धत आपल्याकडे कधी पासून आली, हा एक संशोधनाचा विषय ठरावा. कारण स्वातंत्र्यापुर्व काळात आणि स्वातंत्र्य मिळाल्यानंतर सुद्धा काही वर्ष मान्यवरांच्या हस्ते “दिप प्रज्वलनकरून” एखाद्या कार्यक्रमाची सुरवात व्हायची, हे आपल्याला आठवत असेलच. स्वातंत्र्यानंतरच्या काळात तेव्हांच्या स्वतःला फॉरवर्ड समजणाऱ्या उच्चभ्रू लोकांनी अशा समारंभात ही फीत कापायची पद्धत सुरु केली असावी, असा आपला माझा अंदाज! अर्थात त्याचा उगम नक्कीच त्यांच्या डोक्यतून न हॊता, त्यांनी या बाबतीत सुद्धा इंग्रजांचेच अनुकरण करण्यातून झाला असावा, हे ही तितकंच खरं असण्याची शक्यता जास्त!

हल्ली गल्ली बोळात स्वतःला “नेता” म्हणवणाऱ्या लोकांना तोटा नाही आणि त्यांच्या निरुद्योगी अनुनायांचे तर “सगळं काही” फुकट मिळत असल्यामुळे मोहोळच उठलेलं आपल्याला पाहिला मिळतं. अशा या स्वयंभू नेत्यांना काही उत्साही लोकं आपल्या कुठल्याही “वास्तूची” उदघाटनाची फीत कापायला बोलवत असतात आणि हे नेतेही तेवढ्याच तत्परतेने, उत्साहाने असे समारंभ अगदी अगत्यपूर्वक अटेंड करत असतानां आपण पाहिले असेल. मी वर “कुठल्याही वास्तूची” उदघाटनाची फीत असं म्हटलं, कारण सध्या आधीच नावापुरत्या राहिलेल्या फुटपाथवर, एखाद्या नवीन बांधलेल्या “सार्वजनिक शौचालयाची” फीत कापून त्याच उदघाटन सुद्धा असे नेते करत असतात! एवढच कशाला, त्या सार्वजनिक शौचालयावर स्वतःचा मोठा फोटो आपल्या नावासकट, मोठ्या आणि भडक रंगात रंगवला आहे की नाही याची आधी खात्री करून घेतात आणि मगच त्या शौचालयाचे फीत कापून उदघाटन करतात!

“सकल उत्पन्नाच्या मूलभूत गुंतवणूकीवर मुळापासून कर कापला जाईल! ” हे एखाद्या कंपनीच्या गुंतवणूक विषयीच्या फॉर्मवरच्या सर्वात छोट्या फॉन्ट मधलं प्रिंट केलेलं वाक्य, शुद्ध मराठीत असलं तरी, वाचायला म्हणण्यापेक्षा “कळायला” बऱ्याच जणांना जरा जड जाईल! म्हणून सोप्या चालू भाषेत सांगायचं तर, “Tax will be deducted at source! ” असं म्हणतो, म्हणजे 99% वाचकांचा जीव भांड्यात पडेल, याची मला खात्री आहे!

“अरे काय सांगू तुला, या वेळेस मी दीड लाखाचं फुल सेव्हिंग केलं, तरी पंचावन्न हजार टॅक्स भरायला लागला! “

“टॅक्स! ” तुमच्या माझ्यासारख्या जगातल्या तमाम मध्यमवर्गीयांचा, अगदी कधीही, कुठेही आणि कोणाबरोबरही उगाच “फुकट” चर्चा करण्याचा जागतिक विषय! आता या आधीच्या वाक्यात मी जो “फुकट” शब्द वापरला त्याला कारण म्हणजे, आपल्या सारख्या लोकांनी या विषयावर कितीही वायफळ चर्चा केली तरी, त्याचा सरकारवर दबाव पडून, सरकार टॅक्सच्या टक्केवारीच्या स्लॅबमधे बदल करेल ही शक्यता अजिबातच नसते. हे जरी आपल्या सारख्या लोकांना दरवर्षीच्या अनुभवावरून माहित असलं तरी, त्यावर चर्चासत्र किंवा परिसंवाद हे सगळ्याच बजेट नंतर झडतच असतात!

मंडळी, अजूनही कुठं कुठच्या “कापण्याचे इव्हेंट” होऊ शकतील असे अनेक प्रकार जे मला माहित आहेत, ते आपल्याला सुद्धा माहित असतील. पण एखाद्या लेखाची पण काही शब्दमर्यादा असते हे सुद्धा आपल्या सारख्या चाणाक्ष वाचकांना माहित असेलच! त्यामुळे वरील लेख कोणी छापणार असेल तर, त्यांच्या “एडिटरकडून” मूळ लेखाची (मला) नको इतकी “काट छाट” होण्याआधीच लेख संपवतो!

© प्रमोद वामन वर्तक

संपर्क – दोस्ती इम्पिरिया, ग्रेशिया A 702, मानपाडा, ठाणे (प.) 400610 

मो – 9892561086 ई-मेल – pradnyavartak3@gmail.com

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ ”रमा.. माझा आदर्श..” ☆ संध्या बेडेकर ☆

संध्या बेडेकर

? मनमंजुषेतून ?

☆ “रमा.. माझा आदर्श.. ☆ संध्या बेडेकर ☆

Always Remember Life In Front Of You Is more Important Than Life Behind You.

मी आणि रमा दोघी बाल मैत्रिणी. अगदी शाळेपासून बरोबर. लग्नानंतरही दोघी एकाच शहरात. मी लहानपणी रडू बाई होते. रमा मला सांभाळायची. माझ्यासाठी भांडायची. मला समजावून सांगायची. तिच्या मुळे मी आपली लढाई लढायला शिकले. तिच्या संगतीत माझा आत्मविश्वास वाढला. लग्नानंतर ही आमची दोस्ती आधी पेक्षाही जास्त झाली.

आता तर सर्व मनमोकळेपणाने बोलायला एक भरवशाचे ठिकाण होते. वयाच्या वेगवेगळ्या फेजचे प्रश्नही वेगळेच असतात. त्या त्या प्रश्नांची उत्तर प्रत्येक जण आपापल्या परिस्थिती प्रमाणे, स्वभावानुसार घेत असतोच. बरोबर कोणी आधार देणारं असेल तर प्रवास थोडा सोपा होतो.

रमा नेहमी म्हणते,    

 अग! आपल्या आयुष्याची १००% जबाबदारी आपलीच असते. आपण कसं वागावं? हा आपला निर्णय असतो. लोकांनी ठरवायला आपले प्रश्न म्हणजे काही ग्राम पंचायतीचे मुद्दे नाहीत.

खूप कमी लोक असतात, जे आपल्याला समजतात.

रमा म्हणजे देवाने मला दिलेलं सुंदर, मुल्यवान उपहारच आहे, असं मी समजते.

असे आमचे एकमेकांच्या सहवासात वैवाहिक जीवन मजेत सुरू होते. आमच्या नवऱ्यांची पण दोस्ती झाली, त्यामुळे आमची चौकडी मजेत होती.

रमा तेथे क्षमा अस बरेच जण म्हणायचेही.

आजही मला ती सकाळ आठवते. रामाचा फोन आला. म्हणाली,    

अग! सेवासदन दवाखान्यात तुम्ही दोघे लवकर या. हे चक्कर येऊन खाली पडले. अजय ऑफिस मध्ये गेलाय.

आम्ही दोघं लगेचच पोहचलो. तोपर्यंत सर्व संपलेल होत. सिव्हीयर‌ हार्ट अटॅक. अचानक सर्व जग बदलल. वयाच्या पन्नाशीतच रमावर सर्व जबाबदारी आली. तिची शाळेची नोकरी, अजय नुकताच नोकरीला लागलेला. रमाच्या मुलीचे पल्लवी चे लग्न दोन वर्षांपूर्वीच झालेलं.

हळूहळू परिस्थितीला धैर्याने तोंड देत स्वतः लाच सांभाळत रमा पुन्हा उभी राहिली.

मागच्या वर्षी अजयचे लग्न झाले. अनिता घरात आली.

अजय अनिता, म्हणाले     

अग! आई तुला नोकरी सोडायची असेल तर तू सोड. अगदी मजेत रहा, नोकरीमुळे तुला तुझे छंद, enjoy करता येत नाहिये. रमा छान गाणं म्हणते. वेगवेगळ्या स्पर्धेत भाग घेते. आपल्या मैत्रिणींचा गृप तयार करून त्यांना पण स्पर्धेसाठी तयार करते. हसतमुख मृदुभाषी रमा सर्वांना आवडते. नोकरी मुळे माझा वेळ छान जातो, म्हणून नोकरी पण करते.

पुन्हा एकदा आयुष्याची घडी व्यवस्थित बसली होती, म्हणण्यापेक्षा वैचारिक ताकदीने तिने आयुष्यात सकारात्मक बदल घडवून आणला होता.

अनुजाचां जन्म झाला आणि घरात पुन्हा नव्याने उत्साह संचारला.

देवाने बहुतेक रमाची परीक्षा घ्यायचे ठरविलेच होते.

पुन्हा एकदा ती भयावह सकाळ होती. रमाचा फोन आला म्हणाली,    

अग! पल्लवी ला बरं नाहिये, म्हणून तिला दवाखान्यात भरती केलय. काय झालं? काय नाही? समजायच्या आत पल्लवीला देवाज्ञा झाली.

एका समस्येतून स्वतः ला सांभाळतच होती तर, दुसरी समस्या समोर उभी. पल्लवी ची दोन लहान मुलं, जावयी आणि अर्ध्यावर संसार सोडून पल्लवी गेली.

कधी कधी देवालाही प्रश्न विचारावेसे वाटतात. असं का? कशासाठी एवढी शिक्षा? एक साधारण जीवन जगणारा माणूस अशी एवढी मोठी कोणती चूक करतो? की ही अशी शिक्षा? ग्रहांचा एवढा प्रभाव, एवढी वक्रदृष्टी?? की ज्या दिवशी देवाने रमाची पत्रिका लिहायला घेतली, त्यादिवशी देवाचा मूड ठीक नव्हता.? की मागच्या जन्माचे भोग? हे तर आपल्या समजण्याच्या पलीकडचे प्रकरण आहे.

देवाचा हा हिशेब आजपर्यंत कोणालाच कळला नाही. त्याची आज्ञा मानन्या पलीकडे आपल्या समोर दुसरा काही पर्यायही नसतोच.

 Sometimes you have to accept the facts that certain things will never go back as they used to be.

 परिस्थिती माणसाचा स्वभाव बदलते. कधी माणूस हताश होऊन देवाला, आपल्या भाग्याला कोसतो, तर कधी आपण बघतो 

 Strong men don’t complaint. They adjust, adapt and conquer the situation.

रमा म्हणजे असच एक strong व्यक्तिमत्व.

ती नेहमी म्हणते,    

 Always Remember life in front of you is more important than the life behind you.

पुन्हा एकदा गाडी रूळावरून घसरली. अशा वेळेस प्रत्येक दिवशी एक नवीन परीक्षा असते. Head of the family म्हंटल्यावर तसं वागायची जबाबदारी पण असतेच.

प्रोब्लेम सगळ्यांनाच असतात फक्त त्या प्रोब्लेम मधून बाहेर पडायला भावना, वास्तविकता, समोर उभी असलेली परिस्थिती यांचे विश्लेषण करत दररोज या परिस्थितीत काय महत्वाचे आहे? याचा विचार करून भावनांवर कंट्रोल करता आला पाहिजे. हे तेवढं सोपं काम नाही. त्याकरिता आपल्या पेक्षा दुसऱ्यांच्या भावनांचा विचार करावा लागतो.

. Strong people never accept the definition of life from others. They say,    

 It is my life. I will define it as per requirements of my family.

रमाने पुन्हा एकदा धैर्याने परिस्थिती ला तोंड दिलं. यावेळेस एक नाही दोन दोन परिवारांना सांभाळलं.

काळ कोणत्याही परिस्थितीवर औषध आहे. हे खरंय.

जसजसा काळ पुढे सरकत होता, पल्लवी ची मुलं मोठी झाली.

आज तर शिक्षण संपवून चांगल्या नोकरीत आहेत.

कोणतेही प्रोजेक्ट कसे successfully पूर्ण करावे? हे कोणीही रमा कडून शिकावे.

मधल्या काळात रमाच्या व्यक्तिमत्वाची एक वेगळीच झलक मला दिसली.

अनुजाच्या जन्मानंतर, दुसऱ्या बाळासाठी इच्छा असूनही अजय अनिता दोघे दुविधेत होते.

घरात सर्वच नोकरी करणारे, मग नवीन छोट्या बाळाला कोण सांभाळेल?

यावर चर्चा होताना, रमाने सहजच निर्णय घेतला.

म्हणाली,     

अग! अनिता, मी सोडते ना नोकरी. आता माझी पेंशनेबल नोकरी झालीय. मी लक्ष देईन घराकडे, बाळाकडे. अनुजा ला एक बहिण/ भाऊ नक्की असू दे. अग! काळजी करू नका. मैं हून ना!

हा नोकरी सोडण्याचा निर्णय एवढा सोप्पा होता का? पण अगदी सहजपणे रमाने घेतला. रमा सारख्या लोकांचे विचार vision खूप क्लीअर असतात.

म्हणतात ना,

हम क्या करते इसका महत्व तो हैं ही । परंतु हम किस भाव से करते हैं? इसका महत्व अधिक हैं।

खरंय,

Family is not about blood, It is who is willing to hold your hand when you need to hold it.

आज आम्ही दोघीही सिनियर सिटीझन आहोत. आजही रमाच्या उत्साह बघण्यासारखा आहे. घर, जबाबदारी, त्याचबरोबर आपले छंद जोपासणे याचे गणित/ तालमेल जमत तिला.

मैत्रिणींचा खूप जमावडा नसला तरी चालतो. रमा सारखी एक मैत्रिण म्हणजे माझ्यासाठी लॉकर मध्ये ठेवण्यासारखा मुल्यवान ठेवा आहे.

आम्ही दोघी एकाच वयाच्या मैत्रिणी असलो, तरीही मला तिच्या बद्दल खूप आदर आहे.

Thank you Rama for being with me.

I always enjoy company of People who introduce you to new ways of thinking and new ways of seeing life. They are always very important for me.

© संध्या बेडेकर 

वारजे, पुणे.  

7507340231

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ “सफर!!!” ☆ मोहिनी किंहिकर हेडावू ☆

मोहिनी किंहिकर हेडावू

??

☆ “सफर!!!☆ मोहिनी किंहिकर हेडावू 

‘सफर’ हा हिंदीतला बर का, नाहीतर इंग्रजी शब्द म्हंटल तर अर्थाचा अनर्थ होईल. ! हा सफर म्हणजे प्रवास! यात्रा. !

आता सफर म्हंटल की” हम सफर” हा आलाच.. तो चांगलाच मिळेल तर नशिब.. स्वर्ग दोन बोटे उरले.. वगैरे.. नाहीतर अनुभव.. बाबा आमटे म्हणतातच. ‘An experience is cruel teacher.. it punishes first. teaches later..

आता हम सफर.. हा एक भाग.. दुसरा भाग म्हणजे कशाने प्रवास करणार हा?

‘केल्याने तीर्थाटन! ‘असे म्हंटल आहेच.. कोणताही मोठा पुरुष घेतला तर ते देशभरातून प्रवास करतातच.. अर्थात पायीच. मग ते शंकराचार्य.. जे केरळ मध्ये जन्मले.. अणि श्रीनगर ला पायी गेले.. अणि तपश्चर्या केली.. अणि ह्या प्रवासात भारताचा अभ्यास केला..

गांधीजी, ह्यानी मीठाचा सत्याग्रह पद यात्रेने सुरू केला. विनोबा भावे.. ह्यानी पदयात्रेने भूदान चळवळ सुरू केली..

तर असे हे प्रवास.. !

हा पर्यटन म्हणून आजकाल करतातच.. फक्त साधने बदलली. ‘सजन रे झूट मत बोलो ‘ची बैलगाडी असो वा ‘मांग के साथ तुम्हारा.. ‘ वाली घोडा गाडी.. प्रवास हा आलाच.. साधने तर महत्वाची आहे.. !

कार मध्ये देवानंद ‘चुडी नही मेरा दिल है.. ‘! म्हणतो तर ट्रेन मध्ये ‘ उपरवाला जानकर भी अंजान है’ म्हणून श्लेष साधतो!.. अणि प्रेम व्यक्त करण्याचा प्रयत्न करतो.. !!

तिकडे शर्मिला टागोर जितेन्द्रला.. ट्रक मध्ये ‘हम सफर मेरे हम सफर ‘ म्हणते..

तर जीनत अणि राजेश खन्ना ‘हम दोनो दो प्रेमी’ म्हणत जीवन प्रवासाचा आनंद घेतात..

कारण त्यांना ‘हम सफर ‘ मिळाला आहे फक्त प्रवासच बाकी आहे. !

प्रवासात शॉकच absorber म्हणून भक्कम साथ आहे. !!

ट्रेन, बस ह्याने प्रवास केल्यावर करीना अणि शहीद ह्याना रस्ते आवडून गेले.. अणि ते म्हणतात ‘ मंजिल से रास्ते अच्छे लगने लगे. !

“The last ride together” ही जॉन डन ची कविता खूप गाजली की त्या नंतर जिने हा लग्नाचा प्रस्ताव झिडकारल, त्या गाजलेल्या कवयित्रीने त्याला प्रपोज केले.. and they lived happily ever.. असे झाले.. ! ह्यात कवि म्हणतो.. की. ‘त्याचा सोबत प्रेयसीने घोड्यावर बसावे अणि सोबत त्याने फेरफटका मारावा.. ‘

अणि ती तयार होते. त्या छोट्याश्या प्रवासाचे वर्णन त्याने त्यात केले आहे.. exctasy.. सर्वोच्च आनंद.. देणारा हा प्रवास होता!!

खरा प्रवास हाच आहे की मंजिल दूर आहे.. अणि हम सफर चा हाथ हातात आहे.. शेवटी जन्मापासून मरेपर्यंत हा प्रवास करायचाच आहे.. त्यामुळे destinstion ला पोहोचण्याची घाई नाही करायची बर का… तर प्रवास हाच अनुभव घ्यावा, , उपभोगायचा, साजरा करायचा.. इतक की मंजिल विसरून जाऊ.. ह्यात तद्रूप होऊन जायचे अणि केशवसुतांनी म्हणाल्याप्रमाणे झपूर्झा अवस्थेला पोहोचू शकतो.. !

The road less travelled.. ह्या कवितेत tennyson म्हणतो त्याप्रमाणे धोपटमार्ग.. सोडले की प्रवासात गम्मत येते… अणि काही चांगल करण्याची धमक!!

तर तुमचा प्रवास ठरवा.. साथी निवडा. अणि निघा.. the whole world is with you!!

© मोहिनी किंहिकर हेडावू

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares