मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ माझ्या सासूबाई…… ☆ सौ. जयश्री पाटील ☆

सौ. जयश्री पाटील

? मनमंजुषेतून ?

☆ माझ्या सासूबाई… ☆ सौ. जयश्री पाटील ☆

सासुबाई म्हटलं की नकळतच मनावर दडपण येतं. लग्नाच्या वेळी वाटतच आपली सासरची माणसं कशी असतील. त्यातल्या त्यात सासुबाई कशा असतील. मला वाटतं प्रत्येक स्त्रीच्या मनात हा प्रश्न नक्कीच येतो. सासरी जाण्याआधी मी साखरपुड्याच्या वेळी सासूबाईंना पाहिलं होतं. आमच्या सासूबाई दिसायला सुंदर, गोऱ्यापान, सरळ नाक, नाजूक ओठ, गोल सुबक अंगकाठी, काठापदराची सूती साडी. आधी पूर्वी नऊवारी नेसायच्या पण नंतर नंतर सहावारी नेसायला लागल्या. मी पाहिलं तेव्हा सहावारीतच होत्या. मोजकेच पण ठसठशीत दागिने. कर्नाटक मधील बेळगाव जिल्ह्यातील खानापूर तालुक्यातील करजगी सीमा भागातील माझं सासर. गाव खूप लहान पण आमचं खूप मोठे दुमजली घर. बऱ्याचशा खोल्या भाताच्या मोठमोठ्या कनग्यांनी भरून गेलेल्या असायच्या. मोठं न्हानीघर. मोठा पाणी तापवायचा गोल हंडा. त्यासाठी मोठीच्या मोठी सिमेंटमध्ये बांधलेली चूल. पाणी साठवण्यासाठी बांधलेला मोठा हौद. घराच्या मागे विहीर. विहिरी मधून सतत कोणी ना कोणी पाणी आणायचे आणि तो हौद कायम काठोकाठ भरलेला ठेवायचे. एकत्र कुटुंब चार भाऊ दोन बहिणी आणि त्यांची मुलं. घर भरलेलं वाटायचं. मी लग्न होऊन आले तेव्हा फक्त धाकट्या दिरांचा लग्न व्हायचं होतं. मी महाराष्ट्रातली. माझा कधी खेड्याशी फारसा संबंध आलेला नव्हता. त्यामुळे खेडवळ बोली मी फारशी ऐकली नव्हती. आता तर कर्नाटकातली सीमा भागातली भाषा. भाषा मराठी असली तरी थोडी वेगळी होती. मला ती फारशी समजायची नाही. सासरचे लोक एकमेकांशी बोलताना भरभर बोलायचे. मला एखाद्या वाक्यातील एखाद्या शब्द अडला की माझा विचार करण्यात वेळ जायचा. वाक्याचा अर्थ लावे पर्यंत त्यांचं संभाषण पुढे गेलेलं असायचं. त्यामुळे माझा खूप गोंधळ उडायचा. तिथे सगळा स्वयंपाक चुलीवर केला जायचा. फक्त चहा कॉफीसाठी गॅस तोही गोबर गॅस वापरला जायचा. मला चूल पेटवायला अजिबात जमत नव्हते. लाकडांची रचना करता यायची नाही. फुंकणीने फुंकायला यायचं नाही. तिथल्या तांदळाच्या भाकरी मला तिथे असेपर्यंत कधीच थापायला आल्या नाहीत. मोठे कुटुंब असल्याने मोठ्या पातेल्यांमध्ये स्वयंपाक केला जायचा. तिथे सांडशी वापरत नसत कपड्याने भांडी उतरवणे ठेवणे मला जमायचे नाही. तिथे काही चिरायचं असेल तरी विळा वापरला जायचा. मला आपल्या इकडल्या विळीची सवय. तो विळा मला पायात धरून काही चिरायला यायचे नाही. कपडे धुण्यासाठी पाणी काढणं मला त्रासदायक व्हायचं. अशाप्रकारे मी तिथे किंवा त्यांच्यासाठी कोणत्याही कामाची किंवा उपयोगाची नव्हते. मला सगळं येतं हा गर्व तिथे गेल्यावर गळून पडला. त्यामुळे मी झाडलोट करणे, तांदूळ निवडणे, कपडे सुकत घालणे, कपड्यांच्या घड्या घलणे भाज्या लसूण निवडणे, अशा प्रकारची वरवरचीच कामे करत होते. माझ्या सासूबाई इतर सूनांच्या बाबतीत थोड्याशा कडक होत्या. गावातही त्यांचा दरारा आमच्या गावातील शेजारच्या स्त्रिया सुद्धा त्यांना दचकून असायच्या. पण मला त्या त्यांच्याबरोबर जेवायला घेऊन बसायच्या. त्या माझ्याशी फारशा कडकपणे वागत नाहीत हे माझ्या जावांना दिसत होतं. न राहून एकदा जावेने मला म्हटले, आम्हाला कधी त्यांनी त्यांच्याबरोबर जेवायला घेतलं नाही, तुला मात्र पहिल्या दिवसापासून स्वतःबरोबर जेवायला घेतात. माझ्या सासुबाई कमी बोलणाऱ्या परंतु अतिशय विचारपूर्वक आणि मार्मिक बोलायच्या. नवीन असताना एक खूप मजेशीर प्रसंग घडला. मी धुतलेली भांडी लावायला लागले होते. मी भांडी घेऊन उठणार एवढ्यात सासूबाईंनी वरच्या जाळीतून ताट काढले आणि ते ताट माझ्या डोक्याला जोरात लागले मी जोरात ओरडले माझा जीव कळवळला आणि त्यांना खूप वाईट वाटले त्यांनी माझं डोकं धरलं व चोळायला लागल्या. मी ओरडल्यामुळे सगळे धावत आत आले. काय झाले काय झाले विचारू लागले. माझ्या सासूबाई त्यांना त्यांच्या भाषेत पटपट घडलेलं सांगत होत्या. त्या बोलता बोलता म्हणाल्या ती उठली मी जाळीतून ताट काढत होते आणि तिच्या टकल्याला लागलं. टकल्याला हा शब्द ऐकल्यानंतर त्या अवस्थेतही मला खूप हसायला आलं. कारण आपल्याकडे टकला म्हणजे केस नसलेला माणूस ही संकल्पना होती. तिकडे मात्र डोक्याला टाकलं म्हणायचे. हसल्यामुळे माझ्या वेदना तात्पुरत्या कमी झाल्या. आणि सगळे जणच मग रिलॅक्स झाले. सासूबाईंना खूप वर्षापासून शुगर होती. त्यामुळे त्यांना खूप सांभाळून राहायला लागायचे. माझ्या जाऊ बाईंनी सांगितलं मी घरात आल्याबरोबर त्यांनी घरातलं काम करायचं सोडून दिला आणि त्यामुळे त्यांना शुगर झाली. यांच्या नोकरीमुळे मला सासरी फारसं राहावं लागलं नाही. परंतु आमचे सासू-सासरे वरचेवर दवाखान्यासाठी आमच्याकडे यायचे. ते जरी आमच्याकडे राहायला आले तरी इथलं शहरी वातावरण असल्यामुळे त्यांना इथे करमायचे नाही. मी काही वर्षानंतर सर्विस करायला लागले. आमच्या सासरी माहेरी दोन्हीकडे सुनांनी नोकरी करावी अशी बिलकुल अपेक्षा नव्हती. परंतु मी हट्टाने सर्विसला लागले होते. एकदा माझ्या वडिलांनी सासूबाईंना विचारलं. “सुनबाई नोकरी करते तुम्हाला चालतय का. ” त्यावर त्यांनी एक क्षणभर विचार करून वडिलांना सांगितलं. “इथे तर सगळेच नोकरी करत आहेत. ” कारण आमच्या साहेबांना कामानिमित्त भेटायला येणाऱ्या काही स्त्रिया व त्यांचे संभाषण तसेच प्रत्येक शाळेतील शिक्षकांविषयीची चर्चा त्या नेहमीच ऐकायच्या. त्यामुळेच त्यांना माझ्या नोकरीबद्दल आता काही विशेष किंवा वेगळं वाटत नव्हते. माझ्या सासरी बरेचसे पदार्थ तांदळापासून बनवलेले असायचे. भाकरी केली तरी तांदळाची. भात आमटी तर असायचीच. ओल्या खोबऱ्याचा खूप वापर असायचा. त्या सर्वांना मासे खायची खूप आवड. एक दिवसांआड ते मासे खायचे. मला माशाचं वावडे. मला तिथल्या विहिरीच्या पाण्याचा सुद्धा वशाळ वशाळ वास यायचा. त्यामुळे मला तिकडचे जेवण आवडायचे नाही. तिकडे उपवासाला साबुदाणा बिलकुल वापरत नव्हते त्यामुळे माझा खरोखर उपवास घडायचा. परंतु आमच्या घरातील सर्वांनाच सगळीकडे ऍडजेस्ट व्हायची खूप सवय आहे. जेवणाच्या बाबतीत मी सोडून कोणी फारशी तक्रार करत नाही. परंतु हळूहळू सवय झाल्यानंतर मला तिथले जेवण खूप आवडू लागले. आता तंदुरी रोटी आपण मुद्दाम विकत घेऊन खातो. परंतु गावाकडली पाणी लावून हातावर थापलेली आणि चुलीवर भाजलेली तंदुरी रोटीची चव अप्रतिम लागते. मी जेव्हा सर्विसला लागले तेव्हा माझ्या पहिल्या पगारातील काही रक्कम मी सासरी मनी ऑर्डर केली होती. त्यावेळी फोन नव्हते. पत्रानेच कळवले जायचे. त्यानंतर मे महिन्यात सासरी गेल्यानंतर अंगणामध्ये खूप सुंदर तुळशी वृंदावन बनवून घेतलेले दिसले. त्याला मोठा चौकोनी पारही केला होता. घरात गेल्यानंतर जाऊ बाईंनी सांगितले तू दिलेल्या पगाराच्या पैशांमधून सासूबाईंनी हे सुंदर वृंदावन बांधून घेतले आहे. त्यांची खूप दिवसाची इच्छा पूर्ण झाली होती. माझ्या पैशाचा उपयोग त्यांनी इतका छान केला आहे हे बघून मला खूप आनंद झाला. अजूनही मला वृंदावन बघितली की त्यांची आठवण होते. माझ्या लग्नापूर्वी सासू सासरे आमच्या यांच्याकडे आले होते. त्यावेळी त्यांनी हौसेने या दोघांना चारधाम यात्रेला पाठवले होते. काशीला जाऊन आल्याचे समाधान त्यांना मिळाले होते. माझे लग्न झाल्यानंतर त्या दोघांचेही दात बसवायचे होते. त्यानंतर दोघांचेही डोळ्यांचे ऑपरेशन करायचे होते. एकदा मात्र खूप परीक्षा पाहणारा प्रसंग घडला. सासुबाईंचे डोळ्याचे ऑपरेशन करताना त्यांना येऊन तीन चार महिने झाले तरीपण त्यांची शुगर नॉर्मल येत नव्हती. शुगर नॉर्मल येण्यासाठी पुन्हा तीन महिन्यांसाठी औषध दिले होते. मी त्यांना इन्सुलिनचे इंजेक्शन रोज द्यायचे. आम्ही फ्लॅटमध्ये चौथ्या मजल्यावर राहत होतो. त्यामुळे रोज नर्सला एवढ्या वरती येणे शक्य नव्हते. त्यामुळे मी त्यांच्यासाठी ते शिकून घेतले. त्यांना चहा नाश्ता जेवण वेळेवर देणे आणि गोळ्या देणे हे काम मी जबाबदारीने करत होते. त्यावेळी माझा मुलगा दोन वर्षाचा होता. साहेबांची बदली दुसऱ्या गावाला होती. त्यामुळे ते जाऊन येऊन करायचे. सकाळी जाऊन संध्याकाळी यायचे. सासूबाईंच्या डोळ्याच्या ऑपरेशनची तारीख जवळ आली म्हणजे दुसऱ्या दिवशी त्यांना ऍडमिट करायचे होते. म्हणून मी त्यादिवशी दुपारी त्यांना जेवणाचे ताट ठेवले पाण्याचा तांब्या व फुलपात्र ठेवले आणि आई तुम्ही जेवून घ्या असे सांगितले. तसेच नातवाकडे म्हणजे माझ्या मुलाकडे लक्ष द्या मी बाजारात जाऊन येते असे सांगितले. बरेचसे सामान व भाजी आणायची असल्यामुळे मला यायला जवळ जवळ दीड दोन तास लागले. मी जेव्हा घरी आले तेव्हा गेट उघड होतं आणि मुलगा तिथं खेळत होता. माझ्या हृदयात धस्सं झालं. एवढ्या उंचावरून तो गेटवरती चढून पडला बिडला असता तर अशी भीती माझ्या मनात निर्माण झाली. आईचं कसं काय लक्ष नाही. असं क्षणभर वाटलं आणि आत जाऊन बघते तर काय आई तशाच झोपलेल्या होत्या. टीव्ही तसाच चालू होता. त्यांच्या तोंडातून फेस येत होता. जेवणाचे ताट तसेच उघडे होते. पाण्याचा तांब्या तसाच होता. हे भीतीदायक भयानक दृश्य बघून मला काहीच सुचेना. मी हाका मारायला सुरुवात केली. त्यांचा काहीच रिस्पॉन्स येईना. मी खूप घाबरले पिशव्या तिथल्या तिथे टाकून शेजारी गेले. भाभींना सांगितलं दुलेश कडे लक्ष द्या. मी दवाखान्यात जातेय. मी तसच चप्पल न घालता चौथ्या मजल्यावरून पळत आमच्या थोड्याशा जवळ असलेल्या पाठक हॉस्पिटल मध्ये गेले आणि सरळ डॉक्टरांच्या समोर जाऊन उभी राहिले त्यांना सगळी परिस्थिती भडाभडा सांगितली. त्यांनी लगेच स्ट्रेचर आणि दोन माणसं दिली. ते माझ्या आधी आमच्या अपार्टमेंट वरच्या चौथ्या मजल्यावर पोहोचले. मी पाठीमागून आले त्यांना स्ट्रेचर वर पाठवून मी घराला कुलूप लावले. मुलाला शेजारी भाभींना बघायला सांगितले. काय माहित त्यावेळी माझ्या मनात आले आणि मी रुमाला मध्ये थोडीशी साखर घेतली. मी हॉस्पिटलमध्ये गेले त्यावेळी त्यांना बाहेर झोपवले होते. मी त्यांच्या तोंडात सहजच साखर टाकली आणि काय आश्चर्य त्यांचा फेस कुठल्या कुठे गायब झाला आणि त्या एकदम जाग्या झाल्या “काय झालं ग जया मला ” म्हणून माझ्या गळ्यात पडल्या. मी त्यांची समजूत घातली. डॉक्टरांनी त्यांना सलाईन लावले. संध्याकाळपर्यंत तीन सलाईन झाले होते. डॉक्टरांना पुन्हा एकदा मी सगळी कल्पना दिली. जास्ती सलाईनमुळे शुगर पुन्हा वाढण्याची शक्यता आहे का हे विचारले. त्यांनी रात्रीचे सलाईन थांबवले. तेव्हा आमच्या साहेबांना यायला रात्रीचे नऊ वाजले होते. परंतु तोपर्यंत त्यावेळी डॉक्टरांनी, शेजाऱ्यांनी आणि तिथल्या नगरसेवकांनी खूप धीर दिला. रोज इन्शुलिन आणि गोळ्यांमुळे त्यांची शुगर कमी झाली होती. तसेच दुसऱ्या दिवशी ऑपरेशन म्हणूनही त्यांनी थोडं टेन्शनही घेतलं असावं. परंतु मी खूप घाबरले होते एवढं सगळं करून काही झालं असतं तर माझ्यावर आलं असतं असं वाटलं. शुगर पेशंट जवळून हाताळण्याची माझी पहिलीच वेळ होती. तरी परमेश्वर कृपेने त्यांचे ऑपरेशन वेळेवर पार पडले. त्यानंतर अनेक वर्ष त्या व्यवस्थित राहिल्या. अधून मधून सासू-सासरे यायचे. काही वर्षानंतर सासरे गेले. त्यानंतर त्यांनी आपल्या तब्येतीकडे फारसे लक्ष दिले नाही. शुगर खूप झाली आणि पायाला जखम झाली. हे त्यांच्यावर खूप रागावले. काही दिवसानंतर त्या इकडे आल्या. दवाखान्यात ऍडमिट केले. बरेच दिवस उपचार चालू होते. परंतु शुगर जास्त झाल्यामुळे त्यांचा पाय कापावा लागला. याचे त्यांना अतोनात दुःख झाले. त्यांनी जरी बोलून दाखवले नाही तरी दुसऱ्यावर अवलंबून राहण्याचे त्यांना कदाचित मान्य नव्हते. कदाचित आता त्यांना जगणे नकोसे वाटत होते त्या अवस्थेतच दवाखान्यामध्ये त्यांचे दुःखद निधन झाले. मी आणि ह्यांनी नोकरी सांभाळून त्यांची सर्व सेवा केली. मी घरातून नाश्ता व दोन वेळचा स्वयंपाक करून देत होते. त्यांच्याजवळ दवाखान्यात माझ्या मोठ्या जाऊ बाई राहिल्या होत्या. सासुबाई आता खूप शांत आणि समाधानी होत्या. त्यांचे सर्व कुटुंब सुखा समाधानात होते. त्यामुळे त्या समाधानाने गेल्या. त्यांचे आशीर्वाद सदैव आमच्या पाठीशी आहेत हे जाणवते. त्यांची नेहमीच आठवण येते आणि त्या आठवणींमध्ये त्यांच्याविषयीचा आदर नेहमीच वाढत राहतो.

© सौ. जयश्री पाटील

विजयनगर.सांगली.

मो.नं.:-8275592044

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ कबाड से जुगाड… ☆ सुश्री संध्या बेडेकर ☆

सुश्री संध्या बेडेकर

? मनमंजुषेतून ?

☆ कबाड से जुगाड… ☆ सुश्री संध्या बेडेकर ☆

काल हे वाक्य ऐकलं. ••••

माझी मैत्रीण, मंजू खूप हुशार, स्मार्ट आणि खूप creative. •••• काल तिने आपल्या बगीच्याचे फोटो पाठविले. तिचे छोटेसे Terrace garden. •••पण खूप सुंदर. •••कलात्मकतेने सजविलेले•••. एकदम colourful, vibrant •••. तिचे प्रत्त्येक काम जरा ‘ हटके’ असत. मस्तच असत. ••••

त्याहीपेक्षा जास्त महत्वाचे तिने लिहिलेलं एक वाक्य •••

This is all from, ••• “कबाड से जुगाड” 

कबाड म्हणजे तुटक्या-फुटक्या •••, खराब झालेल्या, •••वापरायला उपयोगी नसलेल्या, ••• फेकायच्या •••, किंवा काही कामाच्या नसलेल्या वस्तू ••• आणि त्यापासून एवढं सुंदर काम. व्वा खूप कौतुक वाटलं मला मंजूचे. ••••••

मला ‘कबाडचा’ अर्थ छान माहिती आहे. कारण माझ्या घरात भरपूर आहे. मी जपून ठेवला आहे ना. ••••कधी तरी कामी येईल. म्हणून•••• हा मनात येणारा पहिला विचार. •••• म्हणून ठेवायचे. •••पण वर्षानुवर्षे निघून जातात, •••पण ती वस्तु काही कामी तर येत नाहीच. •••आपल्या जवळ अशी काही वस्तू आहे, हे पण लक्षात रहात नाही. •••कुठे ठेवली आहे??? हे तर‌ प्रयत्न करुनही आठवत नाही. ••• खुप सांभाळुन ठेवलेली असते ना. •••हे सर्व माहिती असतं, तरी ठेवायचे •••. मुलं, नवरा म्हणतातही. •••• अग! फेक ना‌. हो, हो फेकते. फक्त म्हणायचे. •••••

मी रोड झाले की हा ड्रेस मला होईल. •••रोड होणे जमतं नाही. •••तो ड्रेस काही कामी येत नाही. •••कान नसलेला कप। म्हणे पेन stand म्हणून वापरता येईल. •••, झाकण नसलेली बरणी, कदाचित मनी प्लांट लावायच्या कामी येईल •••••. हॅंडल नसलेला तवा, फोडणीचे भांडे. cracked steel चे डबे प्लास्टिक चे डबे. या तरी मोठया वस्तु झाल्या. अहो, ना•••डा पूर्ण दोन मीटरचा नाही बरं, फक्त एक नाड्याचा छोटासा तुकडा. •••• कधी तरी कामी येतो म्हणे ••••, काही बांधायला श्रीखंडाचा चक्का वगैरे. •••, कानातला एकच(साधाच) टॉप. कारण दुसरा हारवून गेलेला आहे. पुन्हा मिळेल या आशेने सांभाळुन ठेवायचा. ••••

या वस्तू मी का ठेवल्या??? तर कधी कामी येतील म्हणून. ••• यातील एकही वस्तू माझ्या करिता कामाची नाही •••. हे मला माहीत आहे. ••• आणि प्रामाणिकपणे सांगते, ••त्यातील एकही वस्तू पुन्हा वापरली जात नाही. एक तर ती वापरण्यासाठी नसते. ••• दुसरं म्हणजे माझ्यात तेवढी कलात्मकता नाही •••अशी, creativity माझ्यात नाही. की त्या गोष्टींचा वापर/जुगाड करून काही तरी नवीन करेन‌••••

मग मी का फेकत नाही??? फक्त ‘लोभ ‘ व ‘मोह ‘ बाकी काही नाही. •••नंतर फेकते असं म्हणत ••• नंतर नंतर ••••करत या वस्तुंनी घरातली खूप जागा अडवून ठेवली आहे •••.

घर स्वच्छ करणे म्हणजे ही अडगळ पण बाहेर टाकणे होय. ••••घरात असंख्य वस्तू अशा असतील ज्या वेळेवर दिल्या, काही वस्तू, कपडे वगैरे तर दुसऱ्यांच्या कामी नक्की येऊ शकतात. ••• अडगळ काढली तर घरातील negativity जाते म्हणे. ••••.

त्यामुळे मला ‘कबाड’ शब्दाचा अर्थ चांगला माहीत आहे ••••आणि ” कबाड से जुगाड “करून तयार केलेले जग प्रसिद्ध चंडीगढ चे ” रॉक गार्डन” मी बघीतले आहे. या गार्डन चे शिल्पकार श्री नेमीचंद यांच्या ‘कबाड हे जुगाड ‘कलाकुसरीचे खरच खूप कौतुक आहे. •••••

पण असे किती जण असतात???? शंभर पाचशे मधे एखादी स्त्री किंवा पुरुष असेल •••. जी खरच अशा वस्तुंचा वापर करून काही तरी सुबक वस्तू तयार करत असेल •••”. Best from waste “म्हणतात ना ते. ••••

पण नव्याण्णव % बायका फक्त वस्तू जमवून ठेवतात. कधी तरी कामी येईल म्हणून. •••••

बरेचदा बाजारात नवीन प्रकारच्या वस्तू आपण घेतो •••. पण जून्या वस्तू तशाच ठेवतो. •• घरात किती तरी चांगल्या, पण वापरात नसलेल्या वस्तू, उगीच पडून असतात••• कोणाच्या तरी नक्की उपयोगी पडू शकतील. •••••

ते कबाड नाही. •••कोणाच्या तरी कामी येऊ शकणाऱ्या वस्तू आहेत त्या. ••. मग लगेचच द्यावे ना ••••.

द्यायलाही शिकले पाहिजे ••••

माणूस म्हणजे कधी ही न समजणारा प्राणी. •••आणि त्यात स्त्री म्हणजे‌ विचारायलाच नको. स्त्री ला समजणे तर अशक्यच •••कशात जीव गुंतलेला असेल सांगता येत नाही. ••••••

आणि वस्तू “फेकणे “किंवा कोणाला “देणे” तेवढे सोप्पं नाही. त्याकरिता मोठ्ठं मन असावं लागतं•••••

आज तर ” USE. And THROW ” चा ज़माना आहे. ••••

चला, तर मग कबाड साफ करूया, घरातील आणि मनातील सुध्दा. •••

कोरोनाने हात धुवायची, स्वच्छतेची सवय लावलेली आहेच. •••आता घर‌ व मन पण स्वच्छ करूया. •• मनातील अडगळ •••• हेवेदावे, मत्सर, अहंकार, दुःखदायक आठवणी बाहेर काढून टाकुया. ••••

ही दिवाळी वेगळी साजरी करू या. ••••

दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा.

© सुश्री संध्या बेडेकर 

वारजे, पुणे. 

7507340231

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ ‘शिंपलेलं चांदणं…’ ☆ सौ राधिका -माजगावकर- पंडित ☆

सौ राधिका -माजगावकर- पंडित

??

☆ ‘शिंपलेलं चांदणं…’ ☆ सौ राधिका -माजगावकर- पंडित

बागेतल्या बाकावर उदास मनाने बसलेल्या त्या बाबांना मी रोज बघते. कुणाशी बोलणं नाही, हंसणं नाही की, घरी लवकर जाणं नाही. खिन्न मनाने, उदास चेहऱ्याने त्या ठराविक, ठरलेल्या जागेवर बसणाऱ्या त्या गृहस्थांजवळ मी एक दिवस जाऊनच बसले.

“एक विचारू का बाबा? एकटं बसायचा कंटाळा नाही कां हो येतं तुम्हाला? “

“काय करणार पोरी घरीदारी या दुनियेत मी एकटाच आहे. अर्धांगिनी अर्ध्या वाटेवरून सोडून गेली. ती होती तेव्हा तिची किंमत कळली नाही, तिच्याअसण्याचं महत्त्व मला जाणवलचं नाही आणि तिच्या उशिरा उमजलेल्या किमतीचं मोजमाप ऐकायला ती आता या जगातच नाही. कुणाची बोलू मी? काय करू? कसा वेळ घालउ? कळेनास झालंय मला”.

त्या दिवसापासून आमच्यात संवाद सुरू झाले, ओळख वाढली आणि बाबा भरभरून माझ्याशी बोलू लागले. एकत्र बसून डबा पार्टीपर्यंत आमची मैत्री वाढली…

आणि एक दिवस मी त्यांना खुलवण्यासाठी प्रश्न विचारला, ” काय हो बाबा गायला आवडतं का तुम्हाला? माझ्या प्रश्नावर ते गडगडाटी हसत उत्तरले, “मी? आणि गाणं? अगं हा तानसेन गायला लागला ना तर प्रेक्षक सैरावैरा धावत सुटतील. ” बाबांची विनोद बुद्धी हळूहळू जागृत होत होती. माझंच घोडं मी पुढे दामटतच राह्यले. ” बरं राह्यलं! पण बाबा गाणं ऐकायला तर आवडेल ना तुम्हाला? एकटेपणावर मात करण्यासाठी कुठलातरी छंद हा हवाच. छंद माणसाच्या भरकटलेल्या मनाला एके ठिकाणी बांधून ठेवतो. गोंधळलेलं अंतर्मुख झालेलं मन छंदात गुंतवलं ना की सैरभैर होत नाही. असं मला तरी वाटतं हं बाबा “

“ते सगळं ठीक आहे गं, पण माझ्या आयुष्यातले रंगच उडालेत. “

“बाबा दिवाळीत रांगोळीत आम्ही बायका रंग भरतोचं ना! अगदी रांगोळी पुसली जाणार आहे हे माहित असून सुद्धा रांगोळी रंगवतो. प्रसन्न वातावरणात जाऊन, मन आनंदी ठेवून, शुद्ध वातावरणात वावरून, तुमच्याही आयुष्यात तुम्हाला पुन्हा रंग भरता येतील. “

म्हातारपण म्हणजे दुसरं बालपणच असतं नाही का! बाबांच्या निरागस चेहऱ्यावर प्रश्नचिन्ह उमटलं. कालचा ताजा अनुभव होताच माझ्याजवळ. तो धागा पकडून मी म्हणाले, ” बाबा नका म्हणू गाणं! पण सुरेल, सुंदर गाणं ऐकायला तर आवडेल नां तुम्हाला? ”.

“हो तर! तान नाही पण मान डोलवायला नक्कीच जमेल मला. अग पण हल्ली धांगडधिंग्या शिवाय कार्यक्रम होतातच कुठे? आम्ही जुन्या काळातले, जुन्या गाण्यात रमणारी माणसं, आर्केस्ट्राच्या कानठळ्या कोण ऐकेल? “.

“नाही बरं का बाबा! काल मी ऐकलेला कार्यक्रम साधा, सुंदर मनाला भुरळ घालणारा असाच होता. थांबा, ऐका ना! , सविस्तरच सांगते तुम्हाला.. श्रीकांत साने-मृणालिनीताई साने या जोडगोळीने, गायक श्री प्रभाकर कुलकर्णी, वृषाली क्षीरसागर, सौ. साने, हार्मोनियम साथ श्रीकांत साने, व्हायोलियन साथ विवेक बनगे आणि तबला संगत प्रकाश पंडित ह्या समस्त कलाकार मंडळींच्या साथीने एक उत्तम टीम तयार झाली आहे. कोजागिरीचं औचित्य साधून हा बहारदार कार्यक्रम माणिकबाग ज्येष्ठ नागरिक संघाच्या वतीने सुंदर गार्डन गणेश मंडपात खूपच रंगला. सूर्यास्त होऊन चंद्रोदय होण्याच्या मार्गावर चंद्राची गाणी या मंडळींनी सादर केली. जय शारदे प्रार्थनेपासून सुरू झालेला हा सगळ्याच कलाकारांनी सादर केलेला, अतिशय सुंदर, आखीव कार्यक्रम कैवल्याच्या भैरवीपर्यंत येऊन अगदी वेळेत साजरा झाला. आणि तो कधी संपला कळलच नाही. त्यात ‘सखी मंद झाल्या तारका’, ‘चांदणे शिंपीत जाशी’, चंद्र आहे साक्षीला इत्यादी शांत, प्रसन्न गाण्यांचा समावेश होता. तर ‘कशी झोकात चालली’, अरे जा रे नटखट इत्यादी ठेक्यातल्या गाण्यांनी मंत्रमुग्ध होऊन प्रेक्षकांनीही ठेका धरला होता. श्री साने हयांचं हार्मोनियम आणि खुसखुशीत निवेदन, सौ मृणालिनीताईंची माणिक वर्माची सुंदर गाणी, वृषालीताईंची गवळण, श्री प्रभाकर कुलकर्णी ह्यांची सुरेल गाणी, जोडीला श्री. विवेक वनगे ह्यांची व्हायोलिन संगत, श्री प्रकाश पंडितांचा तबल्याचा ठेका, सगळ्यांच्याच साथीमुळे कार्यक्रम बहारदार झाला. प्रत्येकाच्या बोलण्यात विनम्रता होती बालगंधर्वांच्या काळातही हे हौशी कलाकार आम्हाला घेऊन गेले. ‘प्रेक्षक आमचे मायबाप’.. ह्या वाक्याला स्मरून त्यांनी लांबून आल्याबद्दल आमचे आभार मानले तेव्हां त्यांना, धन्यवाद देऊन मी म्हणाले, ” तुमच्या सगळ्यांच्या आवाजातचं इतकी जादू आहे की तो आवाजच आम्हाला इथपर्यंत घेऊन आला आहे”

 – माणिकबाग ज्येष्ठ मंडळींनी अगत्याने दिलेलं दुग्धपान करून पुढच्या कार्यक्रमाचं आमंत्रण घेऊनच, मी त्या श्रीगणेश मंडपातून बाहेर पडले..

बाबांच्या चेहऱ्याकडे बघितलं तर दुःखाच्या काळोखाआडून त्यांच्या चेहऱ्यावर चांदणं पसरल्याचा मला भास झाला. उस्फूर्तपणे ते म्हणाले, “अगं मग मला का नाही नेलंस त्या कार्यक्रमाला? मी पण आलो असतो की, “

“अगं बाई खरंच लक्षातच आलं नाही हो माझ्या. चुकलंच माझं ” ही खंत माझ्या चेहऱ्यावर उमटली.

तेव्हा ते दुःखाच्या पडद्याआडून बाहेर आलेले सद्गृहस्थ म्हणाले, “असू दे! असू दे! पुढच्या वेळेला मला नक्की घेऊन जायचं. तुझ्या रसभरीत वर्णनाने हा रंगभरीत कार्यक्रम ऐकायला मी अगदी उतावळा झालोय बघ. “

“ हो बाबा अगदी नक्की जाऊ आपण” आश्वासन देता देता थर्मासमधलं आटीव केशरी दूध मी पेल्यात भरून बाबांच्या पुढे केलं.

… दुधात चंद्राचं चांदणं मिसळलं होतं तर नवीन छंद गवसलेल्या बाबांच्या चेहऱ्यावरही चंद्र प्रकाश पसरला होता. बाबा निराशेतून बरेचसे बाहेर आले होते, त्या गायक वादक छंद जोपासलेल्या कलाकारांना माझा मनःपूर्वक सलाम..

ह्या मंडळींचा हा, उत्साही वयातला मनाला आल्हाद देणारा पंचाहत्तरीकडे वाटचाल करणारा छंद तुमच्यापुढे यावा म्हणून हा मनापासूनचा लेखन प्रपंच..

© सौ राधिका -माजगावकर- पंडित

पुणे – 51  

मो. 8451027554

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ माऊली… लेख क्र. १८ ☆ सौ. गीता वासुदेव नलावडे ☆

सौ. गीता वासुदेव नलावडे

? मनमंजुषेतून ?

 ☆ माऊली… लेख क्र. १८ ☆ सौ. गीता वासुदेव नलावडे

खादी शिक्षिका गैरहजर असेल, तर तात्पुरता वर्ग सांभाळण्यासाठी पालक-प्रतिनिधी बोलावले जातात. यावर्षी पहिलीच्या नवीन पालक प्रतिनिधी वर्गावर आल्या. त्यांची ओळख करून घेतली. वर्ग छान सांभाळल्याबद्दल त्यांना धन्यवाद दिले, त्यांचे अभिनंदन केलं. पहिलीत असलेल्या त्यांच्या मुलाबद्दल चौकशी केली.

त्यांनी सांगितलेली माहिती ऐकून आश्चर्यचकित झाले, अवाक झाले. त्यांना चक्क नमस्कार केला.

वयाची नुकतीच पंचविशी ओलांडली असेल तिने. परंतु तिचे विचार आणि आचरण दोन्ही अतिशय वंदनीय होते.

मुळात पहिलीत असलेला मुलगा हा तिचा मुलगा नव्हताच मुळी.

तिच्या यजमानांचे पहिले लग्न त्यांच्या मामाच्या मुलीबरोबर झालेलं. तिचं आधीपासून कोणा दुसऱ्यावर प्रेम होतं. या मुलाच्या जन्मानंतर, त्या बाळाला सोडून ती चक्क तिच्या प्रियकराबरोबर पळून गेली.

या बाळाला आई हवी, म्हणून तिच्या वडिलांनी दुसरं लग्न केलं. आणि या माऊलीनं पोटच्या गोळ्यापेक्षा जास्त प्रेम केलं आणि त्याला वाढवलं. दिराचा मुलगा लहान असतानाच, त्याचे आईवडील – हिचे दीर आणि जाऊ – अचानक वारले. हिनेच त्याचंही पालन पोषण केलं, तो आता आठवी इयत्तेत आहे.

खूप कौतुक वाटलं मला तिचं… 

स्वतःच्या मुलाचं सर्वच प्रेमाने करतात. परंतु, एक सवतीचं आणि एक दिराचं, अशा दोन मुलांचे, आपलेपणाने, हसतमुखाने करणे वाटतं तितकं सोप्पं नाही. पण या छोट्या वयात ही माऊली प्रौढपणे ही जबाबदारी पार पाडत होती.

खरोखरच नमस्कार करण्यासारखी ही गोष्ट नाही का?

– लेख क्र. १८.  

© सौ गीता वासुदेव नलावडे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ प्रोत्साहित करणारी एक व्यक्ती आयुष्यात नेहमी असावी… ☆ सुश्री संध्या बेडेकर ☆

सुश्री संध्या बेडेकर

? मनमंजुषेतून ?

☆ प्रोत्साहित करणारी एक व्यक्ती आयुष्यात नेहमी असावी… ☆ सुश्री संध्या बेडेकर ☆

आज ‘ morning walk ‘ला देशपांडे काका, जोशी काका, कुलकर्णी काका, भेटले. ••• तिघे बर्याच दिवसांनी भेटले, म्हणून बगीच्यात बसून गप्पा मारत बसले. ••••

देशपांडे काकांनी विचारले कशी चाललीय मग दिवाळी ची तयारी??? गम्मत म्हणजे तिघांची मुल परदेशी आहेत. ••• कोणाची अमेरिकेत, तर कोणाची जर्मनी ला. ••• त्यामुळे प्रत्त्येक घरी आजी आजोबाच आहेत. •••

कुलकर्णी आजोबा म्हणाले, •••

अहो कसली आलीय दिवाळी अन् दसरा??? मुलं येथे नाही, म्हणून उत्साहच वाटत नाही बघा•••. दोघेच दोघे घरात काय करणार??? अन् काय खाणार??? जोशी आजोबा थोडे अबोलच आहेत, म्हणून फक्त हसले. ••••

देशपांडे आजोबा म्हणजे. ••• full of life, एक आनंदी व्यक्तिमत्त्व, एकदम मस्त, हौशी, सर्वांशी दोस्ती त्यांची. अगदी लहान मुलांपासून ते त्यांच्या पेक्षा वयाने मोठे असणारे सर्व त्यांचे मित्र. ••••

ते म्हणाले, •••• अहो!! असा काय विचार करताय??? आपली मुलं खूप शिकावी. •• पूढे शिक्षणासाठी अमेरिकेत जावी •••. त्यांची खूप प्रगती व्हावी •••. अशी आपलीच स्वप्ने होती ना. ••आयुष्यभर त्याच एका उद्देशाने आपण काम करत होतो ना•••. मग आता आपली स्वप्नं पूर्ण झाली आहेत. ••• मुलं आपापल्या मार्गाला लागली आहेत ••. आता ती आपल्यावर अवलंबून नाही. ••• ही किती आनंदाची गोष्ट आहे ••. अहो!! जेंव्हा मुलं शिक्षणात छान करत होती, ‘scholarship’ वर अमेरिकेत गेली तो आनंद आपणच enjoy केलाय ना.. ••••आपल्या नातलगांमधे त्यामुळे आपल्याला विशेष दर्जाही मिळाला •••. मुलांच्या या सर्व गोष्टींमुळे आपण आनंदाने फुगत होतो त्यावेळी. •••. स्वतः ला नशीबवान समजत होतो. •• कधी कधी ‘ग ‘ ची बाधा पण होत होतीच. •••

अगदी ताठ मानेने, कॉलर वर करून अभिमानाने रहात होतो ना. ••• आकाश ठेंगणे झाले होते त्यावेळेस. •••मग अजून काय पाहिजे??? किती दिवस मुल आपल्या जवळ राहणार?? कधी तरी दूर जाणारच ते. •••. घेऊ दे त्यांना उंच भरारी. आपल्याला त्यात आनंदच आहे •••. शेवटी प्रत्त्येक आई वडीलांची हीच इच्छा असते. ••••

आता आपण येथे, आणि मुलं तिथे. हे त्याच स्वप्नांचे/ आनंदाचे ‘side effects’ आहेत. तेव्हा हे पण त्याच spirit ने घ्यायला पाहिजेत. ••••

मग आता तक्रार नसावी ••. मुलं येथे सणावारी, आपल्या छोट्या मोठ्या अडचणी च्या वेळेस येथे नसतात तर नाराजगी नसावी••••. चेहऱ्यावर वर बिचारेपणाचा भाव नसावा. ••• आणि सर्वात महत्वाचे म्हणजे आपल्या सौ. ना अजिबात रडू द्यायचे नाही आपण. ••••

अहो!! मुलांचा तेथून फोन आला की त्यांचा प्रश्न काहीही असो •••••आमचे उत्तर ठरलेल‌ असत. “आम्ही अगदी उत्तम आहोत. मजेत आहोत. आनंदात आहोत. We are perfectly fine. and enjoying life. ” आम्ही त्यांना आमच्या जबाबदारीतुन मुक्त केलंय. त्यांना काय कमी काम असतात?? lawn maintenance ते laundry. सर्व कामे नोकरी बरोबर करावी लागतात. •••• अजूनही ते आपली जबाबदारी आहेतच. ते तिथे आनंदी रहायला आपण येथे मजेत राहणे आवश्यक आहे. ••••

आता आम्ही त्यांना सल्ले देणे बंद केले••. आपले problem पण सांगतच नाही. ••• “let them live their life. let them enjoy. “

मी खरं सांगू का ••• जोशी साहेब अहो!!

मी तर भारतातच राहुन नोकरी केली. •••पण माझ्या आई वडिलांच्या गरजेच्या प्रत्त्येक वेळेस मी त्यांच्या जवळ होतोच असं नाही झालं ••••. हे चक्र असंच चालू राहणार ••••. परिस्थिती आनंदाने accept करावी. •••

अहो!! आता माझे दुसरे बरेच नवीन नातेवाईक आहेत. ••आम्ही त्यांना आमचे. Indian नातेवाईक म्हणतो. ••आमच्या शेजारचे मुलं, मुली हे सर्व आमचे नातेवाईकच आहेत. ••त्यांच्यात आम्ही आमच्या मुलांना, नातवंडांना बघतो ••. खूप मजेत आहोत आम्ही या मंडळी बरोबर. ••अजिबात एकटेपणा जाणवत नाही. •• देशपांडे आजोबा पूढे मिश्किलपणे म्हणाले••• अहो!! त्या अमेरिकेन नातेवाईकांपेक्षा हे Indian नातेवाईक रोज दिसतात. आधार आहेत आमचे. ही सर्व मंडळी माझ्या करिता खूप खास आहेत. ••••

कूलकर्णी साहेब, आयुष्याच्या वेगवेगळ्या वळणावर काही न काही नवीन होणारच. म्हणून आनंदी रहाणं सोडायचं का?? दिवाळी साजरी का करायची नाही??? सांगा बरं. ••••

अहो!! फराळ अमेरिकेत पोहचला ना, मग झालं. मुलांचे फोन येतात ना. मग अजून काय पाहिजे? आणि समजा नाही आला फोन म्हणजे असं समजायचं 

” No news means good news “

They are fine. ते रमले आहेत आपल्या संसारात, मुलाबाळांमधे. All is well अस समजायचे. ••••

तिथे पण आणि येथे पण. ••• 

आपण स्वस्थ व मस्त रहायचे •••

कुलकर्णी व जोशी आजोबा एकदम charged झाले. •••• पटल त्यांना. •••

घरी आले ते उत्साहातच. काल पर्यंत सर्व गोष्टींना नाही नाही म्हणणारे •••. कशाला??? राहु दे ना. म्हणणारे, आजोबा आजींना म्हणाले, •• “चला लागू या दिवाळी च्या तयारीला “. लगेच शेजारच्या गायत्री ला फराळाचा अॉर्डर दिला. अग!! on line दिवाळी पहाट केंव्हा आहे?? •••आजोबांनी विचारले??? •••

आजी आश्चर्य चकित तर झाल्याचं. पण कुठेतरी आजोबांमधे झालेला बदल बघून‌ त्यांना आनंदही झाला 

म्हणतात ना •••••

“कौतुक करणाऱ्या अनेक व्यक्तिंपेक्षा प्रोत्साहित करणारी एक व्यक्ती सोबत असावी, जी आयुष्यातील सर्व नकारात्मकतेला पुरून उरेल. “••••

© सुश्री संध्या बेडेकर 

वारजे, पुणे. 

7507340231

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ दिवाळीची सांगता… ☆ सौ राधिका भांडारकर ☆

सौ राधिका भांडारकर

??

☆ दिवाळीची सांगता… ☆ सौ राधिका भांडारकर ☆

चार दिवसांची दिवाळी. धामधूमीत आली आणि गेलीही.

खप्पून, पूर्वतयारी करून केलेले फराळाचे भरले डबे तळाशी गेले. रांगोळीतले रंग भुरकटले. तेलवातीत भिजलेल्या पणत्या गोळा करून ठेवल्या. काही दिवसांनी आकाश कंदीलही उतरवले जातील. ईलेक्ट्रीकच्या माळा गुंडाळून पुढच्या दिवाळीपर्यंत नीटनेटक्या कपाटात ठेवल्या गेल्या.

अंगणातला फटाक्यांचा, धूम्मस वास असलेला कचराही गोळा करुन झाला.

गॅलरीतल्या एका टाईलवर सारवलेला गेरु मात्र होता.

कसा रिकामा, रंगहीन दिसत होता. सकाळी झाडपूस करणारी बाई मला विचारत होती, “अव ताई पुसु का आता हे तांबड..? लई वंगाळ दिसतय्. ”

मी म्हटलं, “पुस बाई. झाली आता दिवाळी. ”

महागाई, प्रदूषण, भ्रष्ट राजकारण, जागतिक युद्धे, संहार या सगळ्या पार्श्वभूमीवरही प्रत्येकाने आपापली दिवाळी साजरी केलीच. अंधारावर मात करणारा प्रकाशाचाच सण.

धाग्यांच्या गुंतागुंतीत एखादा कलाबुतीचा तार कसा चमकून जातो ना? तशीच या दिवाळीनं चमक आणली.

चार दिवसांचे चार सोहळे.. गायीला घास भरवला, धनाची पूजा केली, लक्ष्मीलाही पूजलं, रूपकात्मक नरकासुराचाही वध केला, ईडा पीडा टळो, बळीचं राज येवो, असा गजर केला, सहजीवनाची आनंद औक्षणे केली, ऑनलाईन भाऊबीजही साजरी केली. तेल, उटणे, सुगंधी साबणांनी स्नानं ऊरकली. रांगोळ्यांनी दार सजले.

फुलांच्या तोरणांनी चौकट नटली.. कोपरा न् कोपरा प्रकाशानं उजळवला. झुमवर सगळं दूरवरचं गणगोत गोळा झालं. व्हर्चुअल फराळ, व्हर्चुअल फटाके, शुभेच्छा, आशिर्वाद. सगळं सगळं ऑनलाईन..

कसं असतं ना, मनुष्यप्रवृत्ती मूळातच आनंद साजरा करणारी असते. भले आनंदाची माध्यमे बदलोत पण हेतू नाही बदलत. दिवाळी हा तर आनंदाचा, प्रकाशाचा,

स्नेहबंधनाचा, स्नेहवर्धनाचा सण!!

शिवाय या सणांत निसर्ग, देवदेवता, पशुपक्षी झाडंपानं सार्‍यांचं संवर्धन असतं. आपल्या संस्कृतीत केरसूणीलाही लक्ष्मी मानून तिचीही पूजा केली जाते.

यामागचा संदर्भ खूप अर्थपूर्ण आहे. चराचरात लहान थोर असं काही नसतं. मनातली विषमता दूर करुन सार्‍यांना सामावून घ्यायचं असतं. एका वातीनं दुसरी वात पेटते म्हणूनच तेलाचा दिवा पूजनीय.

मनातल्याच आसुरांचा संहार करायचा. नको लोभ, नको स्वार्थ, नको हिंसा, नको असत्य. , नको द्वेष, नको मत्सर. , असुया. वृद्धी प्रेमाची, स्नेहाची.. परोपकाराची व्हावी.

दिवाळी म्हणून साजरी करायची.

दिवाळी आली, संपली पण जाताना याच जाणीवा देऊन पुन्हा येण्यासाठीच परतली.

कवीवर्य ना. धो. महानोर एकदा म्हणाले होते…

“मोडलेल्या माणसांचे..

दु:ख ओले झेलताना..

त्या अनाथांच्या उशाला..

दीप लावू झोपतांना.. ।।

… दिवाळीची सांगता करताना याच ओळी सोबत रहाव्यात…

शुभ दीपावली!!

© सौ. राधिका भांडारकर

पुणे

मो.९४२१५२३६६९

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ ओवाळणी… ☆ श्री नितीन सुभाष चंदनशिवे ☆

श्री नितीन सुभाष चंदनशिवे

? मनमंजुषेतून ?

☆ ओवाळणी… ☆ श्री नितीन सुभाष चंदनशिवे 

 मागच्या दोन वर्षापूर्वीचा एक प्रसंग आहे. मी लिहिलेली ओवाळणीची कविता सोशल मिडियावर व्हायरल झाली होती. ती कविता लातूरला एका व्यक्तीने वाचली. आणि त्याने मला थेट कॉल लावला. आणि जवळपास तो माणूस दहा मिनिट फक्त हुंदके देत राहिला. हुंदका आवरत तो इतकंच म्हणाला.. ‘ सध्या बोलता येत नाही. संध्याकाळी पुन्हा कॉल करतो. फक्त उचला. ’ …. एवढंच बोलून फोन कट झाला.

…… तर गंमत अशी होती की जमिनीच्या झालेल्या वादातून बहीण आणि भाऊ यांच्यात जवळपास चार वर्षे बोलणं बंद झालेलं होतं. ही कविता त्या भावाने वाचली आणि थेट बहिणीच्या घरी सगळी कागदपत्रे घेऊन गेला. सगळी संपत्ती तिच्या नावावर करायला तयार आहे म्हणाला.. ‘ पण हा रुसवा नको ताई ‘ म्हणून मनमोकळेपणाने रडला. दोघेही भाऊ बहीण एकमेकांच्या गळ्यात पडून रडले. आणि संध्याकाळी या दोघांनीही मला फोन करून धन्यवाद दिले होते.

…. माझ्या कवितेला मिळालेलं हे फार मोठं बक्षीस होतं.

तीच कविता पुन्हा एकदा आपल्या हवाली करतोय.

☆ ओवाळणी… ☆

ओवाळणीच्या ताटात नोटा

टाकून झाल्यावर…

त्याने तो कागद पुढे केला 

आणि लहानशी रिकामी जागा दाखवत म्हणाला…

ताई इथं तुझी सही हवीय फक्त…

 

तिने त्याच्या डोक्यावरून हात फिरवला

पदराने डोळे पुसत हसत म्हणाली,

आण तो कागद

दादा सही करते

फक्त एक वचन देऊन जा

वर्षभर आला नाहीस तरी चालेल

दर भाऊबिजेला न चुकता येत जा..

 

माय बाप गेलं

आत्ता माहेरही रुसलं आहे..

मातीतल्या नात्याचं नावही

पुसलं आहे..

 

मुलांना चांदोमामाची ती

रोज गोष्ट सांगते..

मुलं झोपी जातात तेव्हा..

तिच्या डोळ्यात जत्रा

माहेरची पांगते..

 

सुखी ठेव देवा भाऊराया माझा

नवस रोज मागते..

किती किती आणि कितीतरी

भावाचं कौतुक सांगते सासरी..

अन तिच्या माहेरात फक्त तिची

वाट पाहते ओसरी…

 

© श्री नितीन सुभाष चंदनशिवे (दंगलकार)

लेखक / कवी

संपर्क – मु. पोस्ट. कवठेमहांकाळ, जि. सांगली.

मो 7020909521

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ आपण आहोत तोवर… ☆ श्री विश्वास देशपांडे ☆

श्री विश्वास देशपांडे

??

☆ आपण आहोत तोवर… ☆ श्री विश्वास देशपांडे ☆

दिवाळी सुरू आहे. काल नरक चतुर्दशी होती. भल्या पहाटे एका जवळच्या नातेवाईकांचा फोन आला. त्यांनी प्रेमाने शुभेच्छा दिल्या, “ दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा! ” आणि लगेचच थोड्या खिन्न स्वरात म्हणाले, ” आता सकाळी लवकर उठणारी, पहाटे अभ्यंग स्नान करणारी बहुधा आपलीच पिढी आहे. कारण मुलांना कितीही सांगितले तरी त्यांना त्याचे महत्त्व नाही. त्यांची कारणे वेगळी असतात. “

“बरोबर आहे “मी म्हणालो. त्यांनी फोन ठेवला पण ते जे काही म्हणाले त्यावर माझे मन विचार करू लागले. खरंच, आपणच ती पिढी आहोत जी अजूनही पहाटे उठून उत्साहाने या सगळ्या गोष्टी करते. नरक चतुर्दशीच्या दिवशी पहाटे पाच वाजताच रेडिओवर कीर्तन लागायचे ते ऐकूनच जाग यायची. एक वेगळाच उत्साह असायचा. आपल्याकडे घरात वृद्ध आई असेल तर ती अजूनही आपल्याला लवकर उठवते. आपण सगळे उत्साहाने उठतो. आंघोळीपूर्वी अंगाला सुगंधी तेल लावतो. अंघोळ करताना सुगंधी उटण्याचा खरखरीत स्पर्श अनुभवतो, अंगणात दिवे लावतो, देवघर उजळवतो. घराघरात अजूनही आई-वडील, आजी-आजोबा यांचे प्रेमळ स्वर आणि त्यांच्या पावलांचा नाद ऐकू येतो. देवाला नमस्कार केल्यानंतर त्यांना नमस्कार करतो. मागच्या पिढीने आपल्याला सांगितलेल्या बऱ्याचशा गोष्टी आपण पाळतो आहोत. पण पुढच्या पिढीचे काय? ते जपतील का या परंपरा?

माझी सौ. मला नेहमी म्हणते, “ अहो, आपण आहोत तोपर्यंत हे सणवार टिकतील. पुढचं काही सांगता येत नाही. ” तिचं म्हणणं खरं आहे. आपली पिढी अजून काही प्रमाणात तरी परंपरा जपते आहे. पण असं वाटतं की आजच्या पिढीसाठी दिवाळी म्हणजे बहुधा ऑफर्स, सेल्स आणि रील्सचा सण!

एक गोष्ट विशेषत्वाने जाणवते ती ही की 

नातेसंबंध टिकवून ठेवणारी, संपर्क साधणारी, सणाच्या दिवशी “ तुम्ही कसे आहात? ” हे विचारणारी अजूनही आपलीच पिढी आहे. आपल्या नातेवाईकांशी संबंध जपणं, त्यांचं सुख-दुःख विचारणं हे आपल्याला आपल्या संस्कारांनी दिलं आहे.

पण पुढची पिढी जपेल का हे मायेचे आणि प्रेमाचे हळुवार बंध? ही शंका कधी कधी मनाला बेचैन करते.

आपण अपेक्षा करतो त्यांच्याकडून पण त्यांचीही काही एक बाजू असू शकते. कदाचित त्यांना वेळ मिळणार नाही.

किंवा त्यांना तसं गरजेचं वाटणारही नाही.

कारण त्यांच्या आयुष्यात गती आहे, कामाचा ताण आहे, स्पर्धा आहे. जगण्याची व्याख्या वेगळी होत चालली आहे.

त्यांच्याकडे एकमेकांशी जोडणारं वेगवान नेटवर्क आहे, पण नात्यांचंजाळं विरळ होत चाललं आहे.

आपण जेव्हा एकमेकांना भेटतो तेव्हा डोळ्यांतले भाव बोलतात. फार काही सांगावं लागत नाही. स्पर्शाची भाषा खूप बोलकी असते. पाठीवरचा आश्वासक हात, प्रेमळ मिठी सगळं काही सांगून जातात. पण पुढच्या पिढीची भाषा स्क्रीनवर इमोजीमध्ये व्यक्त होताना दिसते आहे. कधी कधी प्रश्न पडतो की आपले हे संस्कार, परंपरा कायम राहतील का? की हा एक इतिहास बनून जाईल?

पण मी याबाबत आशावादी आहे. काळया ढगाला एक रुपेरी किनार असते. तसाच हा आशावाद! मला वाटतं सगळं नाहीसं होणार नाही. परंपरा आणि नाती दोन्ही हळुवार धाग्यांनी काळाशी जुळत राहतात. आजची पिढी कदाचित वेगळ्या रूपात, वेगळ्या माध्यमातून हे सण साजरे करेल हे नक्कीच. पण जर त्या उत्सवात आपुलकीचा एक दिवा तरी पेटला, तर या आपल्या उज्वल परंपरांचा प्रकाश कमी होणार नाही.

पण फक्त असं म्हणून भागणार नाही. स्वस्थ बसून चालणार नाही. आपण आहोत तोवर ही परंपरा जिवंत ठेवायची जबाबदारी आपलीच आहे. ही करताना आपण पुढच्या पिढीला इतकंच सांगायचं की बाळांनो,

सण साजरा करणं म्हणजे फक्त विधी किंवा औपचारिकता नव्हे. सण म्हणजे नात्यांना उजाळा देण्याची, आजच्या भाषेत सांगायचे तर नातेसंबंध रिन्यू करण्याची सुवर्णसंधी आहे. ”

आणि आता ही संध्याकाळ येते आहे. आपण हातात दिवे घेऊन उभे आहोत, त्यांच्या ज्योती अजूनही प्रकाशमान आहेत. हा प्रकाश आपण उपभोगला, आता तो वारसा पुढे द्यायचा आहे. आपल्या हातातील हे दिवे, हा प्रकाश पुढच्या पिढीकडे सुपूर्द करायचा आहे.

त्यांच्या हातात तो गेला की, आपल्या जगण्याचे सार्थक झाले असे म्हणता येईल.

मग आपल्याला म्हणता येईल – 

दिवे लागले रे दिवे लागले 

 तमाच्या तळाशी दिवे लागले…

© श्री विश्वास देशपांडे

चाळीसगाव

प्रतिक्रियेसाठी ९४०३७४९९३२

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ “जगण्याच्या लढाईत जिंकायचं असतं…” ☆ प्रस्तुती – श्री मोहन निमोणकर ☆

श्री मोहन निमोणकर 

🪷 मनमंजुषेतून 🪷

☆ “जगण्याच्या लढाईत जिंकायचं असतं…” ☆ प्रस्तुती – श्री मोहन निमोणकर

आमच्या इथे नव्या पेठेत कपड्यांची मोठ्ठी बाजारपेठ आहे. घरच्यांसोबत तिथे काल दुपारी गेलो होतो. मी केवळ न्याहाळत उभा होतो नि बाकी मंडळी खरेदी करत होती. तालुक्याच्या ठिकाणापासून दूर असलेल्या एका खेड्यातलं कुटुंब खरेदीसाठी तिथं आलेलं.

थोरला मुलगा विशीच्या आतला, धाकटा शाळकरी पोर आणि शाळकरी मुलगी यांच्यासोबत त्यांचे आईवडील होते.

आईच्या अंगावरची साडी साधारण होती, बापाचे कपडे बिनइस्त्रीचे चुरगळलेले. कॉलर आणि बाहीजवळ विरळ झालेला बुशशर्ट, पँटीचे अल्टर केलेले मार्क रंग फिकट झाल्याने स्पष्ट दिसत होते.

मुलीनेही जेमतेम साधा ड्रेस घातलेला. मोठ्या फुलांची डिझाइन असलेला, अगदी गावाकडच्या बहुतांश मुली घालतात तसा पॉलिस्टर टाईपचा.

धाकट्या शाळकरी मुलाच्या अंगावरचा शर्ट बऱ्यापैकी जुना होता.

विशीतला मुलगा बहुतेक शिकायला परगावी असावा आणि तो दिवाळीसाठी गावी आल्यावर, ते कुटुंब इकडे सोलापूरला खरेदीला आलेलं. त्याचे कपडे ठीकठाक होते, पण तेही जुनेर वाटावे, असेच होते.

त्यांच्याजवळची पिशवी खताच्या पॉलिथिन बॅगची होती आणि तळहात मातकट होते म्हणजे ते शेतकरी कष्टकरी कुटुंब होतं.

मुलगी आईला “आधी साडी घे म्हणत होती”, तर थोरला पोरगा “आधी अण्णांना कपडे घ्या ” म्हणत होता.

धाकटा म्हणत होता, “आधी दादाचे कपडे घ्या. “

बाप म्हणत होता, ‘आधी पोरांचे कपडे मग शांतेसाठी (बहुतेक शांता हे त्या माउलीचे नाव) साडी घेऊ. ‘

कुठलेही कपडे समोर आणून उघडले की ते सगळेच एकमेकांच्या नकळत किंमतीचे लेबल पाहत होते.

किंमतीचे अंक इंग्रजीत होते. मात्र अक्षरओळख सगळ्यांना असावी, त्या किंमतीचे प्रतिबिंब त्यांच्या भेदरलेल्या चेहऱ्यावर उमटत होते.

मध्येच आई बोलली की, ‘जरा चांगलेच दाखव बाबा पण इतके महागाचे नको दाखवू!‘

तिने तसे म्हणताच बापाने पोरांच्या नकळत तिचा हात हळूच दाबला नि “असे बोलू नकोस”, म्हणून खुणावले.

ती मौन झाली.

बारकं पोरगं भिरभिरल्या डोळ्यांनी त्या चकचकीत दुकानातल्या सर्व कपड्यांना खिळल्यागत पाहत होतं.

तिथला चकचकाट पाहून मुलगी तर अचंबित होऊन गेलेली.

पुरती स्तब्ध झालेली.

मोठा मुलगा हुशार होता.

त्याने आधी लहान्या बहिणीसाठी ड्रेस पसंत करायला लावला.

धाकट्या भावाच्या पसंतीचा ड्रेस घेतला नि आईच्या मागे लागला, ” साडी पसंत कर! ” ती बाई आवंढे गिळत होती.

मुलांचा बाप मनातल्या मनात आकडेमोड करत होता नि तो कोवळा तरुण डोळ्यातली स्वप्ने गोठवत आईबापाचे डोळे वाचत होता!

त्या डोळ्यात दिसत असलेली कुतरओढ नि त्यांचं अगतिक असणं त्याला सहज वाचता येत होतं! 

पोरगं ऐकेना, म्हटल्यावर त्या माऊलीने नकळत मान मागे घेऊन पदराने डोळयांच्या कडा पुसल्या.

नेमकं त्याच वेळी मुलीने आईला पाहिलं.

तिने काय ते ओळखलं.

“अण्णा मला काय बी नगं!” म्हणून ती बापाला बिलगली!

इतक्या गर्दीतही तो बापमाणूस गहिवरून गेला.

पोरीला कवटाळून तिचे मुके घेऊ लागला! 

त्या क्षणी त्या दुकानात अनेक कुटुंब आणि अनेक माणसं होती, पण त्या सर्वात श्रीमंत कुटुंब ते होतं!

एकमेकांच्या मनातलं ओळखण्याची नि त्याग करण्याची श्रीमंती त्यांच्याकडे होती! 

गरिबी माणसाला खूप काही शिकवून जाते! 

इच्छांना मुरड घालण्याचे कसब गरीब असणाऱ्यास जन्मतःच असते!

त्या कुटुंबाकडे पाहताना नकळत माझे आई वडील आठवले! 

घरादारासाठी खरेदी करताना स्वतःला कपडे न घेणारे, मुलांसाठी मन मारणारे आईवडील!

जगात कुठल्या बापाचा खिसा कधी रिकामा राहू नये नि कुठल्या आईला तिचे मन मारावे लागू नये!

 कारण याचे शल्य आईवडीलांच्या जाण्यानंतर अणकुचीदार होत जाते! 

तिथे असलेल्या त्या कुटुंबाच्या कर्त्या पुरुषात आपल्यापैकी कित्येकांच्या वडिलांचे बिंब दडून होते, आणि कित्येकांच्या इच्छा दफन होत्या!

संवेदनशील असणं वाईट असतं! 

अशी माणसं कधी कुठं दिसली, की वाटतं, “आपल्याकडे खूप सारे पैसे असले पाहिजेत म्हणजे आपण यांना सढळ हाताने मदत करू शकू! “

पण सगळीच माणसं अशी मदत घेत नाहीत. कारण ती हतबल असली, तरी हरलेली नसतात. आणि जी माणसं हरलेली नसतात, तीच माणसं नियतीच्या छातीवर पाय देत विजयी होतात! 

हे कुटुंबही त्यांच्या जगण्याच्या लढाईत जिंकायला हवं! 

अजूनही ते कुटुंब नजरेआड होत नाहीये! 

लेखक : श्री समीर गायकवाड

प्रस्तुती : श्री मोहन निमोणकर 

संपर्क – सिंहगडरोड, पुणे-५१ मो.  ८४४६३९५७१३.

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ “पाडगावकर ऐकतांना…” ☆ सुश्री शीला पतकी ☆

सुश्री शीला पतकी 

? मनमंजुषेतून ?

☆ “पाडगावकर ऐकतांना…” ☆ सुश्री शीला पतकी 

माणसं आता शीळ घालत नाहीत आणि हात हातात घालून जात नाहीत. प्रत्येक वाट गोंगाटाच्या रानातून भयाण शांततेकडे जाते. साऱ्यांची मान खाली असते.. डोळे पडद्यावर.. लॅपटॉपच्या बटनावर.. बोटांची ठोकाठोकी….. त्यावर माणसं ताल देत नाहीत कारण त्यांचाच तोल बिघडत असतो.

….. असं सतत असल्यावर माणसं कुठून गाणार ?

…. पाडगावकर माणसं आता गात नाहीत आणि हातात हात घालून जात नाहीत … 

कटूतेचा पाऊस घर सोडून नव्हे फोडून जातो 

विश्वासाचा कणा केव्हाच मोडून जातो 

बाळाचा पापा घ्यायला त्याला वेळ नसतो /

…. पाडगावकर माणस आता गात नाहीत.. हातात हात घालून जात नाहीत … 

पेटलेल्या दंगलीत माणुसकी खाक झाली

 लोकल मधल्या स्फोटात माणसांची राख झाली

तुमच्या माझ्या डोळ्यासमोर घडलेल्या घटनेला पुरावे लागतात पाडगावकर 

. कुंडीमध्ये फुलं लावणे बंद झाले …. द्वेषांचे मळे फुलवणारे धुंद झालेत

 – – बरं झालं पाडगावकर तुम्ही या जगात नाहीत ….

 …. नाहीतर तुम्ही लावलेल्या कुंडीतील रोप उपटणारे पाहून तुम्हाला दुःख झालं असतं 

खरंच सांगतो पाडगावकर ….

माणसं आता गात नाहीत

हातात हात घालून जात नाहीत

हातात हात घालून जात नाहीत….

© सुश्री शीला पतकी

माजी मुख्याध्यापिका सेवासदन प्रशाला सोलापूर 

मो 8805850279

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares