मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ आता फार काही अपेक्षाच नाही… ☆ तृप्ती कुलकर्णी ☆

तृप्ती कुलकर्णी

🪷 मनमंजुषेतून 🪷

☆ आता फार काही अपेक्षाच नाही☆ तृप्ती कुलकर्णी

फार काही नाही, फार काही नाही 

फक्त रोज एक छोटासा डोस घेत जाऊ 

एक छोटी टॅबलेट हिंसेनी भरलेली

खून, हाणामाऱ्या, अत्याचार यांची

मेजवानी पचवायला शिकवणारी

त्याशिवाय कसं आपण काही मनोरंजन करणार

 

फार काही नाही फार काही नाही 

एक चमचा सिरप रोज आधी घ्यायचं 

शिवराळ भाषेला त्याने पचवायचं 

त्याशिवाय कसं आपण काही ऐकणार, बोलणार 

संवादाची परिपूर्णता त्याशिवाय कशी होणार?

 

फार काही नाही फार काही नाही 

अहो जग मॉडर्न होतंय आता कुठे तुम्ही आहात

कसले संस्कार, सात्विकता का शोधत आहात?

खरंच गरज आहे का या जगाला तुमची,

तुमच्या विचारांची

नाही ना कळलं ????

बघताय का नुसते मग, एक पटकन सुई टोचून घ्या,

मन आणि मेंदू बधीर करण्याची! 

त्याशिवाय कसे तुम्ही इथे जगू शकणार

 

सकाळ, दुपार, संध्याकाळ, रात्र

न चुकता बस इतकं रोज करत जा 

बाकी काही केलं नाही तरी,

हे करणं म्हणजे आत्ताच्या काळात योग्यच की

फार काही नाही फार काही नाही… ‌

 

© तृप्ती कुलकर्णी

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ ”चौकटीबाहेरचा विचार..” ☆ संध्या बेडेकर ☆

संध्या बेडेकर

? मनमंजुषेतून ?

☆ “चौकटीबाहेरचा विचार.. ☆ संध्या बेडेकर ☆

काही लोक ‘out of the box’ विचार करतात.

आज खूप दिवसांनी देशपांडे आजी आजोबा भेटले. माझे आवडते आजी आजोबा आहेत ते. नेहमी उत्साहात असतात. अगदी ‘full of energy’. मागच्या वर्षीच पंचाहत्तरी झाली त्यांची. त्यांचे घर म्हणजे, आजी आजोबा, अजय, अनिता म्हणजे त्यांचा मुलगा सून व नातु अनय.

अजय अनिता दोघे ही नोकरी करणारे व अनय दुसरीत आहे. शाळेनंतर तो ‘डे केअर’ ला जातो. येताना अनिता त्याला बरोबर घेऊन येते. आजी आजोबांना दिवस भर बिझी ठेवायचा, अजिबात शांत बसत नाही अनय. म्हणूनच अजय अनिता ने त्याला ‘डे केअर’ मधे ठेवायला सुरुवात केली.

या घरची संध्याकाळ म्हणजे, अनिता ची धावपळ असते. स्वयंपाक, अनय चा अभ्यास, आजी आजोबांना वेळेवर जेवण देणे, त्यांचे औषधपाणी, अनयची दुसऱ्या दिवशीची तयारी, सकाळच्या डब्याची तयारी, त्यात येणारे जाणारे असतातच. आजी जेवढं जमेल त्यापेक्षा जास्त मदत करतातच. मुख्य म्हणजे दोघे ही जेष्ठ अजिबात घाई गडबड करत नाही. पण अनिता ची ओढताण बघून त्यांना वाईट वाटत. बायकांची नोकरी म्हणजे ‘double front’ वर काम करावे लागते. घर आणि ऑफिस. दोन्ही कामं सोप्पी नाहीत. अजय ही मदत करतो तिला. सकाळी मावशी येतातच. पण घरच्या बाईला लक्ष द्यावेच लागते.

आज शनिवार, अजय अनिता घरीच आहेत. आज आजी आजोबा कोणत्यातरी वेगळ्याच विचारात आहेत. आजोबा म्हणाले, “अजय !! आज तुझ्याशी जरा बोलायचं आहे. तुम्हाला वेळ मिळाला की बोलू आपण. “

अजय अनिता आपापली कामे पूर्ण करून येऊन बसले. आजोबा म्हणाले, “मी काय म्हणतो, ते शांतपणे ऐका. अरे!! आम्ही दोघे वृध्दाश्रमात रहायला जायचा विचार करत आहोत. ” आजोबा थेट विषयावरच आले.

एवढं ऐकलं, आणि अजय तर उठून चाललाच गेला. अनिता ढसाढसा रडू लागली. “आई!! माझी काही चूक झाली का ? मला माफ करा”. तिने आपल्या सासूबाईंचा हात हातात घेतला. तिला रडू आवरत नव्हते.

अजय पुन्हा आला. “काय झालं बाबा ? असं का म्हणाला तुम्ही ? काय चाललंय तुमच्या मनात ? हे असे विचार कसे आले तुमच्या मनात ? कोणी कान भरले का तुमचे ? एका नंतर एक प्रश्नांची झडीच लावली त्याने. त्याच्या डोळ्यात पण पाणी आले होते. आजी पण रडत होत्याच.

आजोबा मात्र शांत होते. अजयच्या खांद्यावर हात ठेवून म्हणाले, “अरे बाबा!! असं काही नाही. आम्ही दोघे खूप मजेत आहोत. खूप आनंदात व आरामात आहो. तुमचे रोजचे काम बघुन आम्हीच थकतो. सध्या तू आणि अनिता वेगळ्याच फेज मधुन जात आहात. करीयर पण बघायचं आहे. अनयकडे पण लक्ष द्यायचे आहे. आमची पण खूप कामं असतात. आम्हाला दिसतंय तुम्हा दोघांना एकमेकांसाठी वेळच मिळत नाही. आणि आम्हाला आमचा वेळ कसा काढायचा??? हे कळत नाही. “

आजोबा पूढे म्हणाले, “अरे !! एखादे छानसे वृध्दाश्रम बघ. अगदी छान सोई असलेले. आम्ही तेथे राहू. आम्हाला पण मित्र मैत्रिणी भेटतील. अरे !! आजही तुमची जबाबदारी आहे आमच्यावर. तुमचा आनंद, तुमची तब्येतही महत्वाची आहे. आणि नवीन पिढी ला पण घडवायचे आहे ना. तेव्हा मी काय म्हणतो, ते लक्षात घे व विचार कर. आणि हो, लोक काय म्हणतील ? याचा विचार करायचा नाही. ते येतात का अनिता ला मदत करायला ? अनयला शिकवायला ?”

“बघू”, म्हणून‌अजय ऊठुन गेला. आज जेवताना डायनिंग टेबलावर सर्व शांत होते.

रविवारी सकाळी आजोबांनी अजयला चौकशी करायला सांगितले व स्वतः येऊन बसले. अजय ने नेटवर चेक करायला सुरुवात केली. ‘अजूनही विचार करा’ असं सारखं म्हणत होताच तो.

शेवटी एक वृद्धाश्रम मनाजोगे वाटले. तेथे जाऊन बघीतले. अजयने खूप चौकशी केली. नियम वाचले. खोली बघीतली. सोई बघीतल्या. डॉक्टर ची सोय आहे. मनोरंजन, जेवण हे सर्व बघून खात्री झाल्यावरच आजी आजोबा तेथे रहायला गेले. हे सर्व प्रत्येकासाठी खूप कठीण होते. पण आजोबांनी निर्णय घेतलाच होता.

आता प्रत्येक ‘weekend’ ला अजय अनिता अनयला घेऊन आजी आजोबांना भेटायला जातात. बरोबर दोघांची औषधं, फळं व इतर त्यांच्या आवडत्या वस्तू नेतात. चांगले दोन तास तेथे बसतात. चौघे बगिच्यात बसून खूप गप्पा मारतात. आता अनय ला एक नाही अनेक आजी – आजोबा मिळाले आहेत. आता सर्वांनाच अनयची सवय झाली आहे. अजय अनिता ही सर्वांना प्रेमाने भेटतात. विचारपूस करतात. आता सर्व weekend ची वाट बघतात. वृध्दाश्रमातील उत्साह वाढला आहे.

आज आजोबा गमतीत अजयला म्हणाले, “अरे !! एवढा वेळ तर आमच्याशी बोलायला, तुम्हाला घरी पण मिळायचा नाही. अरे !! आता वृध्दाश्रमात रहायला जाणे म्हणजे मुलं याना सांभाळत नाही असे राहिले नाही, असा अर्थ निघत नाही. नवीन पिढी, घरातले जेष्ठ, सर्वच महत्वाचे आहेत. काही निर्णय घेताना त्रास होतो. पण ते योग्य असतात. कधी कधी ‘out of box’ विचार करून बघावे. जमलं तर ठीक, नाहीतर आपलं घर आहेच ना. अजय रोज सकाळ संध्याकाळ फोन करतोच. “

आज अनयचा वाढदिवस सकाळी सर्व आजी आजोबांबरोबर झाला. आता संध्याकाळी मित्र मैत्रिणींबरोबर, म्हणुन आजी आजोबा परमीशन घेऊन घरी आले आहेत.

आजोबांचे हे bold decision ऐकुन त्यांच्या बद्दल माझा आदर वाढला आहे.

कधी कधी. “out of the box” विचार करून बघावा. त्याकरिता धाडस लागतं…

© संध्या बेडेकर 

वारजे, पुणे.  

7507340231

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ “आयडियाची कल्पना…” ☆ श्री सुधीर करंदीकर ☆

श्री सुधीर करंदीकर

? मनमंजुषेतून ?

☆ “आयडियाची कल्पना…” ☆ श्री सुधीर करंदीकर

ऊन ‘मी’ म्हणतयं, अशा वेळेस आपण पण “मी” म्हणायचं 

ऊन मी म्हणतयं म्हणजे ऊन कमी व्हायला तयार नाही. अशा वेळेस आपण पण मी म्हणायचं, म्हणजे मी पण उन्हापासून बचावाकरता काहीतरी मार्ग काढीनच्..

यावर्षी उन्हाळा खूपच म्हणजे खूपच जास्त जाणवतो आहे. उन्हात फिरल्यामुळे बऱ्याच जणांना छोटे मोठे आजार होत आहेत, त्रास होत आहेत. ऑटो करून बाहेर पडलो तरी उन्हाच्या झळा लागतात आणि उन्हाचा त्रास हा होतोच होतो.

सर्व जाणकार आणि तज्ञ मंडळी सांगत आहेत की सध्या तरी 25 मे पर्यंत दुपारी 11 ते संध्याकाळी 5 पर्यंत घराबाहेर पडूच नका.

ज्यांचा व्यवसायच बाहेर फिरून काम करणे आहे त्यांना तर पर्यायच नाही, पण इतर मंडळी मात्र दुपारी बाहेर जाणे नक्कीच

टाळू शकते. ऑफिसच्या कामाकरता / क्लासेस करता ऑनलाइन पद्धत पण उपलब्ध आहे.

पुणे तिथे काय उणे या म्हणी प्रमाणे पुणेकरांना दुपारी बाहेर न पडणे वगैरे मान्य नसते.

कुणाचे लग्नाचे वाढदिवस, कुणाची ७५ री, कुणी परदेशातून आले म्हणून त्यांच्या स्वागताकरता पार्टी, रिडेव्हलपमेंट नंतर नवीन घर मिळाले त्याबद्दल वास्तुशांती कार्यक्रम, वगैरे वगैरे, असे कार्यक्रम अजूनही पुण्यामध्ये भरदुपारी हॉटेलमध्ये होत असतात.

कार्यक्रम आणि जेवणाची वेळ दुपारी एक वाजता असते. आणि बोलावलेली सगळीच मंडळी असे कार्यक्रम अटेंड करत असतात, कारण ऊन आहे या कारणाकरता नाही कसं म्हणणार, अशी सगळ्यांना अडचण असते.

आज सकाळीच एका मित्राला सहज गप्पा मारायला फोन केला होता.

मी : नमस्कार, काय चाललंय ? उन्हापासून काळजी घे. दुपारी बाहेर पडू नकोस.

मित्र : अरे मी कालपासून श्रेयस हॉटेलमध्ये काल आणि आज असे दोन दिवस राहायला आलोय

मी : अरे पुण्यात तुझं घर असून हॉटेलमध्ये, हा काय नवीन मूव्ह आहे

मित्र : अरे बायकोच्या मैत्रिणीच्या जावयाला मोठ्या पोस्ट वर प्रमोशन मिळालं आहे, त्यानिमित्त ओळखीचे आणि नातेवाईक यांना आज पार्टी आहे. डेक्कन वर याच श्रेयस हॉटेलमध्ये. दुपारी 12 ते 3 वेळ आहे.

मी : पण तू दोन दिवस हॉटेलमध्ये का आहेस 

मित्र : सगळीच तज्ञ मंडळी सांगत आहेत की मे महिन्याच्या 25 तारखेपर्यंत दुपारी घराबाहेर पडू नका. मी बायकोला सुचवले की मैत्रिणीला कार्यक्रम थोडा पुढे ढकलायला सांग, म्हणजे उन्हाचा कोणाला त्रास होणार नाही. कारण अशा कार्यक्रमाकरता मुहूर्त बघणे वगैरे असा प्रकार नसणार.

बायको म्हणाली, तुम्ही म्हणताय ते कारण कोणालाही पटणार नाही. अशा विचारांना पुण्यामध्ये निगेटिव्ह अटीट्युड असे म्हणतात.

तुम्हाला ते समजणार नाही, तुम्ही येणार नसाल तर तसं सांगा, मी एकटी जाईन.

आपण बायकोला काही सुचवणं आणि ते लॉजिकल असलं तरी बायकोला ते पटणं, असं कधीच होत नसतं. (बहुतेकांचा असाच अनुभव असणार).

त्यामुळे मीच विचार केला की आपणच काहीतरी सोपा पर्याय काढावा.

मी : तुझं म्हणणं आणि तुझा अनुभव अगदी बरोबर आहे, कार्यक्रमाचं काय ठरवलं शेवटी

मित्र : आमच्या घरापासून दुपारी साडेअकरा वाजता रिक्षेने डेक्कन ला जायचं, आणि कार्यक्रम झाल्यानंतर दुपारी कडक उन्हात अडीच वाजता पुन्हा रिक्षाने घरी यायचं, म्हणजे ऊन्हाला – ‘आ बैल मुझे मार’ असे सांगण्यासारखेच आहे.

रिक्षेमध्ये प्रवास करताना उन्हाच्या झळा लागतात, आणि कार्यक्रम हॉटेलमध्ये म्हणजे तिथे एसी असतो. म्हणजे आधी झळा आणि नंतर लगेच गारवा, म्हणजे तब्येतीचे आणखीन बारा.

काय मार्ग काढावा !, काय मार्ग काढावा!, असा विचार करत मी खिडकीतून बाहेर ऊन्हाकडे बघितलं आणि मला मार्ग सापडला.

हॉटेल श्रेयस मध्ये मी दोन दिवसां करता खोली बुक केली. काल संध्याकाळी ऊन उतरल्यानंतर आम्ही दोघेजण श्रेयस मधे आलो.

काल रात्रीचं जेवण इथेच घेतलं, आज सकाळचा नाश्ता पण इथे झाला. त्यामुळे रोजच्या खाण्यात आणि चवीमध्ये पण अनायसेच छान बदल मिळाला.

आजचा कार्यक्रम याच हॉटेलमधल्या हॉलमधे आहे. आमची खोली दुसऱ्या मजल्यावर आहे. दुपारी रूम मधून खाली हॉलमध्ये कार्यक्रमाला जाऊ, जेवण आणि गप्पा टप्पा आटोपल्या, की वरती पुन्हा खोलीमध्ये येऊन आराम करू. अजूनही कोणी ओळखीच्यांना उन्हात घरी जायचं नसेल, तर त्यांना पण खोलीवर घेऊन येऊ.

संध्याकाळी हॉटेल मधून चेक आउट करू आणि रिक्षा करून घरी जाऊ.

माझ्या या प्लॅनिंगमुळे उन्हालाही बरं वाटेल, की आपल्यामुळे यांना त्रास झाला नाही. आणि आपल्याला पण उन्हाचा त्रास नाही, ज्यांच्याकडे कार्यक्रम ते पण खुश, आणि बायको पण खुश

मी : तुझी आयडिया एकदमच जबरदस्त आहे. इथूनच तुला सलाम करतो.

ऊन कमी झालं की जून महिन्यात ठरवून एकदा भेटीचा कार्यक्रम करू, मित्रांना पण बोलवू, भरपूर गप्पा टप्पा करू, मस्त मजा येईल.

बाय-बाय झाले आणि फोन संपला.

(आपल्या मित्रमंडळींना लेख फॉरवर्ड केला तरी छानच. म्हणजे सगळेच उन्हापासून काळजी घेतील आणि इतरांची काळजी करतील.)

 

© श्री सुधीर करंदीकर

मो. 9225631100 – ईमेल – srkarandikar@gmail. com

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ “एक अवलिया अस्सल कलावंत !” ☆ डॉ. धनंजय देशपांडे ☆

डॉ. धनंजय देशपांडे

? मनमंजुषेतून ?

☆ “एक अवलिया अस्सल कलावंत !” ☆ डॉ. धनंजय देशपांडे

जगदीश खेबुडकर

जगदीश खेबुडकर यांच्याशी माझी चांगली मैत्री होती मी कलाकार डिरेक्टरी सन २००० मध्ये सुरु केली ज्यात सर्व कलाकाराचे नाव पत्ते असायचे… त्यात पहिली प्रस्तावना त्यांनी लिहून पाठवली होती.

तर पत्रकारिता करत होतो तेव्हा एका मुलाखतीत मला त्यांनी एक गुपित सांगितलं आणि मी ते छापलं 

ज्यावर नंतर त्यांच्यावर कौतुकाची जणू सुनामी आली 

झालं असं की.. ‘अष्टविनायक’ नावाचा मराठी सिनेमा येत होता. त्यात सर्व आठ गणपतीच्या गावाचे आणि त्यांचे वैशिष्ट्य वर्णन करणारे गाणे लिहून हवे होते जे खेबूडकरांनी लिहून दिले 

“अष्टविनायका तुझा महिमा कसा”.. हे ते गाणे 

आणि कहर म्हणजे तुम्ही आता पुन्हा ते गाणे नीट ऐका ज्यात आठही गणेश मंदिराचे व परिसराचे यथार्थ वर्णन केले आहे 

मात्र खेबुडकर म्हणाले,

“ अहो पत्रकार महाशय… मी यापैकी एकही देवळाला भेट दिलेली नाही !”

यावर मी उडालो होतो. विचारलं की “ मग कस काय परफेक्ट वर्णन ? “

तर मिश्किल हसत म्हणाले “ मी प्राचीन ग्रंथ पण वाचत असतो “

खरा किस्सा त्यानंतरचा आहे. हे गाणं एका रात्रीत तयार झालं आहे.

त्याचं झालं असं खेबुडकर जेव्हा मुंबईत यायचे तेव्हा एका ठराविक बिल्डिंग मध्ये उतरायचे.

खेबुडकर मुंबईत आलेत हे कळल्यावर निर्माते शरद पिळगावकर यांनी ताबडतोब खेबुडकर यांना गाठलं आणि गाडीत घालून घरी आणलं आणि म्हणाले की “ अष्टविनायकावर तुम्हाला गाणं लिहायचं आहे. ” 

खेबुडकर म्हणाले की “ऑलरेडी याच्या आधी शांताराम नांदगावकर आणि शांताबाई शेळके यांनी लिहिलेली आहेत गाणी अष्टविनायकावर… ”

तर पिळगावकर म्हणाले “ते बाजूला ठेवा. मला तुमच्याकडून हवं आहे. ” 

– – आणि विशेष म्हणजे तोपर्यंत खेबुडकर हे लावणी लिहिण्यासाठी फेमस झाले होते तरी पण पिळगावकरांनी त्यांच्याकडून लिहून घेण्याचा हट्ट धरला आणि त्यांना घरातल्या रूममध्ये बंद केलं.. गाणं पूर्ण केल्याशिवाय उठायचं नाही असं सांगून!

खेबुडकर यांनी चंग बांधला आणि सलग एकटाकी असं म्हणतात तसं गाणं लिहून काढलं.

– – – आठ कडव्याचं गाणं. रेकॉर्डिंग सुमारे 13 मिनिटाचं… एवढं मोठं गाणं तोपर्यंत मराठी फिल्म इंडस्ट्रीमध्ये झालं नव्हतं. दुसऱ्या दिवशी सकाळी प्रभादेवी स्टुडिओमध्ये रेकॉर्डिंग झालं त्यावेळेला अचानक पिळगावकर म्हणाले खेबुडकर यांना की “गाणं पण तुम्हीच गायचं आहे. “

(खेबूडकर यांचा खडा आवाज सर्वांना माहीत होता.) मात्र तोपर्यंत बाकी दोन गायक आलेले होते.. अनुराधा पौडवाल वगैरे. म्हणून खेबुडकर म्हणाले “ त्यांना गाऊ द्या. शेवटचं एक कडवं फारतर मी गाईन”

.. आणि सातव कडवं खेबुडकर यांच्या आवाजात रेकॉर्ड झालं आणि त्या गाण्याने नंतर रेकॉर्ड ब्रेक केलं. आजही ते गाणं गणेशोत्सवाच्या काळात वाजत असतं.

असा हा सगळा महिमा अष्टविनायकाचा … खेबुडकरांचा … आणि त्यांच्या कौशल्याचा !!

असे होते कविराज ते..

साक्षात दंडवत त्यांना !

© डॉ. धनंजय देशपांडे (dd)

(सायबर सिक्युरिटी तज्ञ, चित्रकार, लेखक, समुपदेशक, निवेदक)

मो न. ९४२२३०४३४४ 

1) Global Cyber Crime Helpline National Award winner

2) Digital Hero of the year National Award winner

3) HOD: Cyber Awareness Foundation, Maharashtra State

4) Mentor: Pune University (SPPU), CANADA and UK

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ माझी मुक्तेश्वरी… ☆ श्री संदीप रामचंद्र सुंकले ☆

श्री संदीप रामचंद्र सुंकले

? मनमंजुषेतून ?

माझी मुक्तेश्वरी… ☆ श्री संदीप रामचंद्र सुंकले 

वैशाख वद्य दशमी, शके १९४८..

 संत मुक्ताबाईंची पुण्यतिथी.. त्यानिमित्त त्यांचे पुण्यस्मरण… !

 

मुक्ताई,

अनेक आशिर्वाद.

खरंतर माझी स्थिती त्या चांगदेवांसारखीच झाली आहे… ! मायना काय लिहावा, याबद्दल मी थोडा गोंधळलो आहे… ! कारण, तू फक्त वयाने लहान, आणि ज्ञानाने मात्र मोठी… आणि मी फक्त वयाने मोठा… !

तू म्हणशील लोकं तुला ‘माऊली’ म्हणतात… !

पण खरं सांगू यात माझे असे काय आहे… ?

गीता भगवंताने सांगितली म्हणजे यात माझे काही नाही… !

माझ्या सद्गुरूंनी, आपल्या निवृत्तीदादांनी माझ्याकडून ती लिहून घेतली… !

दादाचे आपण आजपर्यंत ऐकतोच, मग यात माझे ‘कर्तृत्व’ ते काय.. ?

आईबाबा गेल्यावर लहान असूनही तूच आम्हाला आधार दिलास… !

‘… …… …… ‘

हा असे का बोलत आहे ? असा तुला प्रश्न पडला असेल ना ? अग आज तुझी पुण्यतिथी!! म्हणून तुझ्याबद्दल चार शब्द सांगावे, असे निवृत्तीदादाने मला सांगितले… !.

अग, मला मांडे भाजून दिलेस ना ?

… तेव्हा तू माझी ‘आई’ झालीस… !

मला ‘ताटी ‘उघडायला लावलीस..

तेव्हा तू माझी समजूत काढणारी ‘ताई’ झालीस… !

हे दोन प्रसंग सर्वांना माहीत आहेतच… !

पण असे अनेक प्रसंग… !

मला नेहमी प्रश्न पडतो की तुम्ही मुली, प्रसंग आला की लगेच मोठ्या कशा होता… ?

मला तुझा खूप आदर वाटतो, मोठा आधार वाटतो आणि कौतुकही वाटतं… !

आपण चार भावंड! सर्वात शेवटी तुझं नाव घेतलं जातं… पण तूच सर्वश्रेष्ठ आहेस असे मला नेहमी वाटतं आले आहे… !

… कारण आजही या जगात ‘मातृत्व’भावच सर्वश्रेष्ठ आहे..

सदगुरुकृपेने लोकं मला ‘माऊली’ म्हणतात. पण आईनंतर तूच माझी ‘माऊली’ झालेली आहेस, त्यामुळे तूच सर्वश्रेष्ठ आहेस… !

मला तुझा अभिमान वाटतो… !

.. माझी मुक्तेश्वरी!!

तुझं कौतुक कदाचित केलंल तुला आवडणार नाही, पण आज तरी मला माझ्या लाडक्या मुक्तेचं मन भरेस्तोवर कौतुक करू दे… !

– – मुक्ते!! आज सामान्य जनांना नुसतं ‘मुक्त’ करून चालणार नाही तर आपला ‘नरेंद्र’ (स्वामी विवेकानंद) म्हणतो तसे लोकांनी गोरगरिबांची सेवा करायला हवी… !

आपल्या ‘भारतमाते’ला आज त्याचीच गरज आहे असे मला वाटते.

तू आदिशक्तीचा अवतार आहेस, मुक्त होण्यासाठी सर्वजण तुझ्याच चरणी येतील, तेव्हा तू हे सर्वांना सांग, सांगशील न… ?

चल मुक्ते, थांबतो… !

तुझ्याशी बोलून आज मला खूप आनंद झाला… !

तुझा,

ज्ञानादादा.

© श्री संदीप रामचंद्र सुंकले (दास चैतन्य)

थळ, अलिबाग. 

८३८००१९६७६

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ ”आयुष्याची extra किल्ली नकोच..” ☆ संध्या बेडेकर ☆

संध्या बेडेकर

? मनमंजुषेतून ?

☆ “आयुष्याची extra किल्ली नकोच.. ☆ संध्या बेडेकर ☆

“आपल्या घराची एक ‘ extra’ किल्ली नेहमी शेजारी असावी. हे नक्की. पण आपल्या आयुष्याची किल्ली मात्र स्वतः कडेच ठेवावी. ”

आज मी खूप उत्साहात आहे. काय कारण असावं माहीत नाही. पण आज भरपूर ऊर्जा आहे. मला छान वाटतय. खूप काम करावसं वाटतंय. मन गुणगुणतय. आजच्या या उत्साहपूर्ण दिवसांचा चांगला उपयोग करून घ्यायचा हे मी लगेच ठरवलं. आजकाल असे दिवस दररोज उगवत नाहीत. म्हणून मी सगळ्यात आधी मस्त चमचमीत जेवणाचा बेत ठरविला. घर अगदी चकाचक करायचे ठरविले. एकानंतर एकेक काम आठवतं गेली व आज जास्तीत जास्त काम करायची हे लगेच ठरविले. कामे केंव्हा, कशी करायची याची रूपरेषा मनात ठरवून टाकली. आता एवढ्या कामांची लिस्ट समोर म्हंटल्यावर कामाची स्पीड वाढवायलाच हवी. हे सर्व ठरवत असताना च मधे दोन मिनिटे काढून वॉशिंग मशीन लावली. म्हणजे आजची सकाळ वेगळीच उगवली.

बहुतेक माझी झोप चांगली झाली होती. स्वप्न पण छान पडलं होतं. पावसाळी मन प्रसन्न करणारी हवा होती. त्यातच रेडिओ वर पहिलंच मस्त आवडीचे गाण ऐकलं.

” मस्ती भरा है समा,

 हम तुम हैं दोनो यहां.

 आंखो में आ जा, दिल में समा जा,

 झूमें ज़मीं आसमां । “

वाढत्या उत्साहात भर पडली. तसे मागच्या पंधरा वर्षांपासून आम्ही दोघेच असतो पण “Today it’s different. ”

कारण काहीही असू दे. लगेच हा दिवस cash करायचाच. असं मी ठरवलं.

सर्व अगदी मजेत सुरू होत. हळदीचे डाग पडतात व कपडे खराब होतात, असा रोजचा विचार आज बाजूला सारून, रोजपेक्षा वेगळा ड्रेस घातला. मनात म्हंटल पडले डाग तर पडू देत.

” बहुत कपड़े हैं अपने पास । ”

मन लावून एकेक पदार्थ लक्ष देऊन केला. पाहुण्यांसाठी जपून ठेवलेली क्रोकरी उत्साहाने काढणार, तेवढ्यात फोन वाजला, लगेचच घेतला. एका मैत्रिणीचा होता.

वेळ आहे का ग.???

असं म्हणून आमच्या गप्पा नेहमी प्रमाणेच सुरू झाल्या. मी उत्साहात होतेच. लगेच आजचा माझा बेत मी तिला सांगितला.

खीर, पूरी, बटाटा भाजी, चटनी, कोशिंबीर भजी, मसालेभात, मसाला ताक (मठठा) वगैरे वगैरे.

बाप रे!! आज काय विशेष ग?? तिने विचारले.

कोणाचा वाढदिवस की काय??

काही नाही ग सहजच.. सणवार, वाढदिवस वगैरे काहीच नाही. मी म्हंटल. असच काहीतरी वेगळं करावं म्हणून करतेय. सर्व झालंय, फक्त मसालेभात तेवढा राहिलाय. येतेस का जेवायला?? मी सहज विचारलं.

लगेच ती म्हणाली, अग! तुला कंटाळा नाही येत का?? मला तर आता एवढा कंटाळा आला आहे. रोज रोज, तेच ते, तोच तोच, आपल्या हातच जेवून स्वयंपाक करून करून मी थकलेय.. मी तर आता जेमतेम जेवढी गरज असेल तेवढंच काम करते व बाकी जास्तीची कामे तर अजिबात करतच नाही. कोणी येत जात नाही. त्यामुळे तर अजून काही करत नाही. कंटाळा तर रोजच येतो.

अग! तू आणि मी एकाच वयाच्या ना, मग तुलाही आता कामाचा कंटाळा येतच असणार नाही का?? बघ बाई, खूप करायला जाऊ नको, नाही तर उद्या कंबर दुखायची.

झालं, एवढं पूरे होत. मलाही ते पटले. मनाने सहजच पलटी मारली. उत्साही मनाने कुलांटी मारली. अचानक घड्याळ उलटे सुरू झाले. आता विचारांची दिशाच बदलली. म्हणजे. ‘ Follow Me ‘ सारख तिच्या मागे माझे मन चालू लागले.

मलाही थकल्या सारखे वाटू लागले. कुठे तरी ‘कंटाळा ‘ शब्द डोक्यात छान बसला. व आपला असरही दाखवू लागला.

आता मनात नवीन विचार येऊ लागले. मसालेभात राहू दे का?? बाकी एवढं सर्व आहेच ना. म्हणजे नाही केलं तरी चालेल. एवढं पचलही पाहिजे ना. आजकाल जास्त जेवले की त्रासही होतो. ‘कंटाळा’ शब्दाला साजेसे व स्वतःला सोईस्करपणे पटणारे विचार मनात येऊ लागले. स्वतः शी च बोलणे होत होते.

गॅस बंद करून थोड्या वेळ शांत बसले.

एकदम विचारात बदल कसा काय झाला?? संगतीचा असर का? तरी संगत दुरुनच होती. फक्त फोनवर. तरी एवढा प्रभाव कोणाच्या तरी बोलण्याचा होऊ शकतो का?? मग माझ्या उत्साहपूर्ण दिवसाचे काय?? सर्व मुसळ केरात??

एकदम दिवस कंटाळवाणा वाटू लागला. थकल्या सारखे वाटू लागले. क्रोकरी वगैरे नकोच, राहू दे. उगीच फूटली तर सेट खराब व्हायचा.

म्हणजे तिच्या म्हणण्याने माझी नकारघंटा सुरू झाली. एकदम विचारांची दिशाच बदलली.

माझी अवस्था मलाच कळत नव्हती. मनात कुठेतरी तरी अस्वस्थता जाणवू लागली. मी हा असा विचार करणे योग्य आहे का??

म्हणतात ना,  “संगतीचा असर पडतो. ”

हो बरोबर आहे. ती पण तर माझ्या संगतीत तेवढ्याच वेळ होती ना, मग तिला मी प्रभावित का करू शकले नाही.????

तिचा कंटाळवाणा दिवस उत्साहात मी का बदलू शकले नाही.???? मी पण सांगू शकले असते ना,

अग! नाही, असं अजिबात नाही. वयाप्रमाणे थकवा येतो कधी कधी. नाही असं नाही. पण आजचा दिवस खुप छान उगवला आहे. म्हंटल आनंद घेऊया आज. कधी कधी काही तरी वेगळं असावं ना. आपल्यालाही छान वाटत असे प्रसंग स्वतः च निर्माण करायचे असतात. कशाला वाट बघायची वाढदिवसाची किंवा सणाची. आणि जेवढं पचेल तेवढच खायचं. अग! छान वाटत. स्वतः चीच पाठ थोपटावीशी वाटते. आनंदी दिवसाची वाट बघण्यापेक्षा हातात असलेला क्षण/ दिवस आनंदात कसा घालवता येईल यांचा विचार करावा.

माझ्या अशा बोलण्याने तिच्यात कदाचित बदल झाला असता. बरे असो,

माझ्या आनंदाची किल्ली मी तिला दिली आहे का?? घराची एक extra किल्ली शेजारी नेहमी द्यावी. हे बरोबर आहे पण आपल्या आयुष्याची किल्ली जर दुसऱ्या च्या हातात दिली तर बंदर च्या खेळाप्रमाणे तो डंबरू वाजवणार आणि आपण नाचायचं का?? आपले निर्णय ते घेणार का?

लगेच सर्व मरगळ झटकली. सर्व कंटाळा डिलीट केला. व पुर्वीच्या उत्साह मोड मधे आले. आरशात बघीतल. स्वतः चेच कौतुक केले मनात म्हंटल,

” अभी तो मैं जवान हूं ” ।

व लगेच उत्साहाने कामाला लागले. क्रोकरी काढली. टेबल सजवले. बगीच्यातून गुलाबाची फूल फ्लॉवर पॉट मधे सजवली. प्लेट मधे सर्व वाढले. छान गाणी लावली. फोटो काढला. काही लोकांचा कंटाळा जाऊन उत्साह यावा या उद्देशाने फेस बुक वर फोटो पोस्ट केला.

रोज पेक्षा दोन घास जास्त खाल्ले.

थोड्याच वेळात उत्साही फेस बुक प्रेमी active लोकांचे comments ही आलेच.

  •  व्वा काकू मस्तच
  • Wow!! so tempting
  • Great, , Kaku You Rock
  • मी पण उद्या नक्की करते
  • Enjoy Kaku n Kaka

वाचून छान वाटल. मेहनतीचे चीज झाले, अस वाटल.

मी स्वतः लाच धन्यवाद दिला. छान स्वयंपाक केला, हे कारण तर होतच. पण दुसरं म्हणजे नवीन सूत्र ” Follow yourself ” हे पाळल्या बद्दल.

कोणी काय बोलावे?? काय सांगावे?? यावर आपलं नियंत्रण नसते. पण त्यांचे किती ऐकायचे?? किती नाही?? यावर आपल्याला नियंत्रण नक्की ठेवता येते.

तरीही संगत महत्वाचीच. माझी आई नेहमी म्हणत असे, तुम्ही ज्या प्रकारच्या व्यक्तिंच्या सहवासात राहाता, त्या सर्वांचे एव्हरेज व्यक्तिमत्त्व तुमच घडत जातं. नकळत त्यांचे विचार तुम्हाला पटत जातात.

लोक निंदा करतात तर मी दुःखी होते.  लोक स्तुती करतात तर आनंद होतो.  म्हणजे माझ्या सुख दुःखाचे बटन दुसऱ्यांच्या हातात आहे का?? बटन आपल्या हातात असावे. स्वतःला जे पटेल तेच करावे.

आत्मविश्वास.. हीच आनंदी आयुष्याची गुरुकिल्ली आहे

“Say Or Do what you feel. It is not being rude. It is called being real. ”

आयुष्य माझ आहे ते मी माझ्या मनाप्रमाणे जगणार.

© संध्या बेडेकर 

वारजे, पुणे.  

7507340231

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ मूड! ☆ श्री प्रमोद वामन वर्तक ☆

श्री प्रमोद वामन वर्तक

? मनमंजुषेतून ?

☆ मूड! ☆ श्री प्रमोद वामन वर्तक ☆

आता माझा मूड नाही! “

हे वाक्य अखिल मानवजात आपापल्या मातृभाषेत किमान दिवसातून एकदा किंवा सकाळी उठल्यापासून काहीच मनासारखं होतं नसेल तर अनेकदा वदत असावी!

एवढंच कशाला, ज्या लहानग्यांना या शब्दाचा अर्थ तर सोडाच, स्पेलिंग पण येत नसेल अशी चिमुरडी मुलंसुद्धा हा शब्द, अर्थात आपल्या पप्पा, मम्मीचे ऐकून आजकाल उच्चारत असतात, आता बोला!

प्रत्येक शब्दाचे एक उगम स्थान असते, तसे या मूड शब्दाचे पण असावे, पण ते सांगण्याच्या मूड मधे मी नाही, असं मी म्हणणार नाही, कारण ते मला खरंच ठाऊक नाही! आणि यात कमीपणा असण्याचे सुद्धा काही कारण नाही, असं आपलं मला माझा मूड चांगला असला तरी वाटतय! या माझ्या अशा वाटण्याला वाचकांचा मूड चांगला नसेल तर बाधा येण्याचा संभव नाकारता येत नाही बरं का मंडळी! तर अशा या मूड शब्दाच्या उत्पत्तीवर भाषा शास्त्रातले जाणकारच त्यांचा मूड असेल तर, अधिक प्रकाश टाकतील या बद्दल मला शंका नाही!

माझ्या मनांत कायम एक प्रश्न माझा मूड चांगला असला की या संदर्भात उभा राहतो. तो असा, की हा मूड शब्द प्रचारात येण्याआधी आपण सगळेच त्यासाठी कोणता पर्यायी शब्द आपापल्या मातृभाषेत वापरत होतो? या माझ्या प्रश्नावर सुद्धा वर म्हटल्या प्रमाणे पुन्हा भाषाशास्त्रातले जाणकारच एकदा त्यांचा मूड नसला तरी प्रकाश टाकू शकतील याची बालंबाल खात्री मला आहे! आता तुम्ही म्हणाल प्रथम मी शंका नाही असं म्हटलं आणि आता बालंबाल खात्री आहे असं कोणत्या मूड मध्ये म्हणतो आहे? तर तुमच्या या मनांत उभ्या राहीलेल्या प्रश्नाला उत्तर देण्यासाठी मला कुठल्याही मूडची आवश्यकता नाही बरं का मंडळी! तुमच्या मनांत असा प्रश्न तुमचा मूड चांगला नसल्याने जर का उभा राहिला असेल तर त्याचे उत्तर असं, की पहिल्या प्रश्नाचे उत्तर भाषातज्ञाना देता आल्यावर माझा हा दुसरा प्रश्न त्यांच्यासाठी, त्यांचा मूड कसाही असला तरी, किस झाडकी पत्तीच वाटणार! म्हणूनच मी खात्रीपूर्वक असा शब्द माझा मूड चांगला लागल्याने वापरला. असो!

ह्या मूड शब्दाला निदान आपल्या मराठी भाषेत तरी कोणता पर्यायी शब्द आहे, हे जर मला लवकरात लवकर कळले (हे परत भाषातज्ञाच्या मूडवर अवलंबून बरं का) तर मी त्याचा प्रसार आणि प्रचार करण्यासाठी वचनबद्ध आहे आणि माझ्या कोणत्याही मूड मधे हे असिधाराव्रत पूर्ण करण्याचे मी ठरवले आहे. मग ते करत असतांना समोरच्या माणसाचा मूड काय आहे हे मी कधीच ध्यानात घेणार नाही, याची माझी मलाच खात्री आहे! कारण कितीही झालं तरी मूड हा शब्द आपल्या मातृभाषेतला नाही, हे आपण आपला मूड कसाही असला तरी मान्य करालच कराल! तो आपण सर्वांनीच कुठून आणि कसा उचलला, आपल्या समृद्ध अभिजात मराठी भाषेत आणला आणि आपल्या कुठल्याही मूड मध्ये तो वापरण्या इतका, आपण आपल्या नकळत कसा प्रचलित केला, हा सुद्धा एक संशोधनाचा विषय ठरू शकेल! किंवा या मूड शब्दाचा आपल्या साहित्यात कुठल्या लेखक महाशयांनी, त्यांच्या कुठल्या मूड मध्ये प्रथम वापर केला, हा सुद्धा तुमच्या मूडला साजेसा नसला तरी, वरील संशोधनाचा उपप्रश्न ठरू शकतो यात दुमत असण्याचे कारण नाही आणि या अशा उपप्रश्नामुळे कुणाचा मूड बिघडेल असं मला अजिबात वाटत नाही.

माझ्या लिहिण्याच्या मूडमधे मी लिहीत गेलो आणि आपला मूड हे वाचत असतांना कसा होता आणि आता हे सगळे वाचून झाल्यावर कसा आहे, हे आपण मला, आपला मूड लागेल तेव्हा नक्कीच कळवाल, या आशादायक मूड मध्ये मी सध्या आहे, याची खात्री बाळगा!

आपल्या सर्वांचाच मूड (दुसरा पर्यायी शब्द कोणीतरी सांगे पर्यंत) काही ना काही कारणांनी कायमच चांगला राहो, हीच त्या विधात्याच्या चरणी (ज्याचा मूड कधीही बिघडत नाही असं काही भाविक म्हणतात) माझी मूडभरी प्रार्थना!

 

© प्रमोद वामन वर्तक

संपर्क – दोस्ती इम्पिरिया, ग्रेशिया A 702, मानपाडा, ठाणे (प.) ४०० ६१०

मो – 9892561086 ई-मेल – pradnyavartak3@gmail.com

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ कविता माझ्या नि तुझ्या… ☆ संगीता कुलकर्णी ☆

संगीता कुलकर्णी

? मनमंजुषेतून ?

☆ कविता माझ्या नि तुझ्या ☆ संगीता कुलकर्णी ☆

कविता म्हणजे भावनांच्या आकाशात उमटलेला शब्दांचा चंद्र…

ती कधी मनाच्या वेदनांना स्पर्श करते तर कधी आनंदाच्या क्षणांना सुंदर रंग देते. “कविता माझ्या नि तुझ्या” हे केवळ शीर्षक नाही तर दोन मनांच्या भावविश्वाला जोडणारा एक हळवा प्रवास आहे.

कविता म्हणजे फक्त शब्दांची मांडणी नसते ती मनाच्या भावनांना मिळालेली सुंदर अभिव्यक्ती असते.. प्रत्येकाच्या आयुष्यात काही क्षण असे येतात जे बोलून व्यक्त करता येत नाहीत तेव्हा कविता आपल्या भावना अलगद शब्दांत उतरवते. “कविता माझ्या नि तुझ्या” म्हणजे दोन मनांमधील नात्याची भावनांची आणि आठवणींची एक सुंदर सांगड होय.

तुझ्या कवितेत प्रेमाची कोवळी चाहूल असते… तुझ्या प्रत्येक ओळीत स्वप्नांचे मोर नाचत असतात… तुझे शब्द जसे मंद वाऱ्याच्या झुळुकीसारखे मनाला स्पर्शून जातात तसेच माझ्या कवितेत आयुष्याच्या अनुभवांचे गहिरे रंग असतात. माझ्या शब्दांत कधी संघर्षाची कहाणी असते तर कधी आठवणींच्या पावसात भिजलेले क्षण… या दोन्ही कविता जेव्हा एकत्र येतात ना तेव्हा त्या जीवनाचे सुंदर गीत बनून जातात… तसेच

तुझ्या कवितेत प्रेमाचा गोडवा असतो तर माझ्या कवितेत आयुष्याचे अनुभव. तुझ्या ओळींमध्ये स्वप्नांची रंगीत दुनिया असते तर माझ्या शब्दांत वास्तवाची जाणीव… पण या दोन्ही कविता एकत्र येतात तेव्हा त्या जीवनाचा अर्थ अधिक सुंदर करून जातात.

कविता ही माणसाच्या मनाचा आरसा असते. मनात दडलेले भाव न सांगितलेली दुःखे, अपूर्ण स्वप्ने आणि निरागस आनंद हे सर्व कविता सहज व्यक्त करते. कधी एखादी कविता डोळ्यांत अश्रू आणते तर कधी तीच कविता जगण्याची नवी प्रेरणा देते म्हणूनच कविता ही केवळ साहित्य नसून ती आत्म्याची भाषा आहे.

कविता माणसाला संवेदनशील बनवते. आनंद, दुःख, विरह, मैत्री, निसर्ग, प्रेम अशा अनेक भावनांना कविता सहज व्यक्त करते… म्हणूनच कविता ही प्रत्येकाच्या जीवनातील एक जिवलग मैत्रीण आहे.

आजच्या धावपळीच्या जीवनात कविता माणसाला थोडा वेळ स्वतःकडे पाहायला शिकवते. ती मनाला शांतता देते आणि विचारांना नवी दिशा देते. “कविता माझ्या नि तुझ्या” हा केवळ शब्दांचा प्रवास नाही तर दोन मनांच्या भावविश्वाला जोडणारा एक सुंदर पूल आहे..

तुझ्या आणि माझ्या कवितेत फरक असला तरी त्यांचा उद्देश एकच असतो मनाला स्पर्श करणे. तुझ्या ओळींमध्ये चांदण्यांची कोमलता आहे तर माझ्या शब्दांत सूर्यकिरणांची ताकद…

तुझी कविता स्वप्न दाखवते आणि माझी कविता त्या स्वप्नांना वास्तवाशी जोडते. या दोन भावना जेव्हा एकत्र येतात तेव्हा त्यातून जीवनाचा खरा अर्थ उमलतो.

आजच्या यांत्रिक आणि धावपळीच्या जीवनात कविता माणसाला स्वतःशी बोलायला शिकवते. ती मनाला शांतता देते.. विचारांना दिशा देते आणि भावनांना मुक्तपणे व्यक्त होण्याचे स्वातंत्र्य देते. कविता माणसाला अधिक संवेदनशील, अधिक जिवंत बनवते… कविता ही मनाची भाषा आहे… ती जितकी तुझी आहे तितकीच माझीही… कारण प्रत्येकाच्या आयुष्यात एक तरी अशी कविता असते जी त्याच्या मनात कायम जिवंत राहते.

शेवटी एवढेच म्हणावेसे वाटते की,

कविता माझ्या नि तुझ्या” म्हणजे दोन हृदयांची अव्यक्त कहाणी…

एक शब्द तुझा, एक भावना माझी,

आणि त्यातून जन्म घेणारे एक सुंदर विश्व..

हीच खरी कविता…

 

©  संगीता कुलकर्णी 

लेखिका /कवयित्री

ठाणे मो. 9870451020

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ काय बनायचं.. गाढव? की घोडा? – लेखक : श्री नाना पाटेकर☆ संकलन व प्रस्तुती – श्री सुनीत मुळे ☆

श्री सुनीत मुळे

? मनमंजुषेतून ?

☆ काय बनायचं.. गाढव? की घोडा? – लेखक : श्री नाना पाटेकर☆ संकलन व प्रस्तुती – श्री सुनीत मुळे

एक पिढी शिक्षण घेऊन गाढव बनली.. आणि आता..

नवी पिढी शिक्षण घेताना रेसचा घोडा बनत आहे.

 

.. परीक्षेत १००% पाहिजेत..

.. कराटे क्लासमध्ये Black बेल्ट मिळवायचा आहे.

.. त्यानंतर Dance क्लास attend करायचा.

.. भगवतगीता स्पर्धेत जायचं आहे. श्लोकांचा अर्थ कळला नाही तरी ते तोंडपाठ करायचेच. कारण first prize मिळालंच पाहिजे!!

.. मग drawing competition असते.

.. तिथून बाहेर निघाला की चालला तबला वाजवायला… संगीत विशारद बनायला.

 

–– Albert Einstein बनवून देणाऱ्या Multi -National School आल्या. पण Albert हा Einstein बनण्यासाठी शाळेत गेला नव्हता.

–– एक अमिताभ बनला तर हजारो acting school उभ्या राहिल्या. पण अमिताभ अभिनेता बनण्यासाठी कोणत्याही School मध्ये गेला नव्हता.

— आता लवकरच मोदी तयार करणाऱ्या शाळा उभ्या राहतील. आणि पालक लाखो रुपये फी भरून त्यात मुलांना पाठवतील. आज मुलाच्या शिक्षणासाठी जेवढा खर्च एका वर्षाला होतो, तितके रुपये त्याच्या घेण्यासाठी सुद्धा लागले नाहीत.

 

आता शाळा सुरु केल्या आहेत investors नी.. मागणी तसा पुरवठा ह्या तत्त्वावर. पालकांना आपल्या मुला-मुलीला रेसचा घोडा बनवायचं आहे, ही मागणी पाहून जास्तीत जास्त अभ्यास मुलांच्या डोक्यात कोंबायला सुरुवात केली. दप्तराचं आणि पालक-शिक्षकांचं अपेक्षांचं ओझं वाहणारी मुले म्हणजे चालती बोलती प्रेते बनत चालली आहेत… जरा शुद्धीवर आली की “what is square of 12? ” असं विचारून त्यांचं बालपण चिरडून टाकतात.

 

मुलांना एक प्रश्न विचारला होता — ” तुमच्यापैकी किती जण घाम गळेपर्यंत खेळतात? “

तेव्हा एकाही मुलाने हात वर केला नाही. कारण आता मुले AC मध्ये जन्म घेतात, AC मध्ये वाढतात. चिप्स खातात, soft ड्रिंक पितात आणि mobile वर game खेळत बसतात….. ऊन, पाऊस, वारा ह्याच्याशी संबंध येत नाही… पडणं-लागणं, खेळात हरणे माहीतच नाही… School bus आली नाही तर शाळेपर्यंत चालत जाण्याची ताकद मुलांमध्ये नाही.

.. वय वर्ष ६ पार होत नाही तर डोळ्याला चष्मा लागतो. हात पायांच्या एक तर काड्या होतात नाहीतर 

लठ्ठपणा वाढतो. कारण शारीरिक कष्ट संपले.. आणि Modified food starch, maltodextrin, hydrolyzed corn gluten, disodium inosinate/ guanylate, yeast extrac, hydrolyzed soy protein मिसळलेले पदार्थ खाणे सुरु झाले. ह्या ingredients ची खासियत म्हणजे ते मुलांच्या पोटात

 शिरून जास्त काळ टिकतात आणि पोटातील पोषके शोषून घेतात. मुलांची hormonal आणि जैविक वाढ रोखतात. ज्यामुळे मुले दुबळी होत जातात. हे घटक पिझ्झा-बर्गरमध्ये असतात.

.. म्हणून भारत लवकरच diabetes चे सर्वाधिक रुग्ण असलेला देश बनणार आहे. सोबत इतरही विकार येत आहेत.

 

शेंगदाणे, चणे, रवा, तांदूळ, बाजरी, सुका मेवा आणि फळे ह्यात घातक ingredients नसतात.

लापशी, सातू, शिरा, पोहे किंवा अंड्याचे घरी बनवलेले पदार्थ मुलांना उत्तम पोषण पुरवतात.

ते मिळत नसल्यामुळे मुलांची शारीरिक वाढ नीट होत नाही. प्रतिकार क्षमता संपते. मग…

vitamins, DHA, minerals देणारे product विकत आणून ते खायला देतात.

… वास्तविक, शरीर हा जगातील सर्वात मोठा कारखाना आहे. ह्याच शरीराला योग्य आहार, कष्ट मिळाले तर कुठेही तयार न होऊ शकणारं रक्त तयार होतं. साध्या भाज्या, अस्सल भारतीय जेवण मिळालं की शरीराची यंत्रणा स्वतः काम करते. म्हणून ताज्या भाज्या, भाकरी खाणारी आणि मिनरल्स, calcium, proteins माहीत नसलेली माणसे १०० वर्षे जगली – – आणि हे माहीत झालेली माणसे फक्त ६० वर्षे जगतात…तेही अनेक रोग सोसत, औषधे घेऊन!!

 

खेळ, व्यायाम, भटकंती आणि दर्जेदार वाचन न केल्यामुळे मुलांना मानसिक कमतरता जाणवते.

संघर्ष माहीत नसतो आणि team work कळत नाही.

मित्र फक्त WhatsApp, face बुक वर भेटतात. प्रत्यक्ष भेट नाही. सुख-दुःखाची देवाण-घेवाण नाही आणि मित्राचा-मैत्रिणीचा मानसिक आधार नाही. दिलखुलास हसणे आणि ओक्साबोक्शी रडणे मानसिक आरोग्यासाठी चांगले असते… ह्या दोन्ही क्रिया मुलांना करता येत नाहीत. आपोआपच, जरा मनाविरुद्ध घडलं की लहान मुले-मुली आत्महत्या करतात. बरीच एकुलती एक मुले दुसऱ्याशी जमवून घेण्याची सवय नसल्यामुळे पुढे लग्न झाल्यावर वर्षभरात घटस्फोट घेतात.

… ज्या मुलांना बहीण नसते, चांगली मैत्रीण नसते, त्यांचा स्त्रियांकडे पाहण्याचा दृष्टिकोन संकुचित बनतो.

… ह्या उणिवांचा शिक्षणात विचार केलेलाच नाही. भारतीय शिक्षण पद्धत सर्वांगीण नाही हे शिक्षण-तज्ज्ञ सांगत होते तोवर शिक्षणाचा धंदा सुरु झाला. मोठे उद्योजक, पुढाऱ्यांनी शाळांमधून गुंतवणूक करून शिक्षण संकल्पनेला धूळ चारली.

… एखादी स्त्री गरोदर राहिली तर जन्माला येणाऱ्या जीवाच्या admission ची तयारी सुरु होते.

कृष्णाला जन्मण्याआधी मारायची तयारी मामाने केली होती…

.. आता मूल जन्माला येण्याआधी त्याला रेसचा घोडा बनवायची तयारी सुरु होते. आता मुलाने बोलायला सुरुवात केली की थेट E =MC square म्हणायचं बाकी राहिलं आहे.

 

– – अशी मुले सर्व formula पटापट म्हणून दाखवतील पण स्वतःचा formula कधीही शोधू शकणार नाहीत.

 – – guitar शिकतील पण स्वतःची संगीत रचना करू शकणार नाहीत.

लता मंगेशकर, सचिन तेंडूलकर, मेरी कोम ह्यांचं अनुकरण अचूक करतील. पण स्वतःची ओळख निर्माण करणार नाहीत. कारण त्यांना फक्त अनुकरण करायला शिकवलं जातं. जगायची कला, गीत-संगीतातील आनंद, निसर्ग संपदेची भव्यता, नव्या संकल्पनांची निर्मिती, जुन्या विचारांचा आधार, साहित्य ह्याला बाजारू किंमत नसल्यामुळे फक्त जे विकलं जातं तेच ज्ञान मुलांना मिळतंय, त्यात ते पारंगत होत आहेत.

 

… काही जणांना campus मध्ये दर महिना ४ लाखांपेक्षा जास्त पगार असणारी नोकरी मिळतेय… पण त्यात देशाचं नाही.. भांडवलदारांच हित साधला जातंय.

… पुढची पिढी मोठी पदवी मिळवेल पण न स्वतः जगण्याचा आनंद लुटू शकतील, न दुसऱ्याला जगण्याची मजा मिळू देतील…

 

अगदी हाच धोका ओळखून जपानमध्ये शाळेत AC लावत नाहीत. तिथे मुलांना घोकंपट्टीपेक्षा practical वर भर देतात. वृक्ष-वेली स्वतःच अन्न स्वतः तयार करतात त्या प्रक्रियेला काय म्हणतात? … असे प्रश्न विद्यार्थ्यांना न विचारता शाळेत व बाहेर भाजी लावायला शिकवतात. त्या रोपांची-वेलींची जोपासना करायला लावतात.

– – “निप्पोन technology ” ने केलेल्या तपासणीत म्हटलं आहे की शाळेच्या आवारातील वेलींमुळे तापमान चार अंश कमी झालं आहे. आणि मुले पाना-फुलांसोबत भावनिक नातं जोडू लागली आहेत.

– – जर्मनी मुलांना Transference शिक्षण देते. तिथे लहान मुलांची बोटे नाजूक असतात हे लक्षात घेऊन दुसरीपर्यंत लेखन करू देत नाहीत. पाचवीपर्यंत practical चालतं आणि त्यानंतर विद्यार्थी बँक कर्मचारी बनेल की हवाई सेविका.. प्रशासन सांभाळेल की कुशल कामगार होईल.. ह्याची सतत तपासणी होते.

 दहावीनंतर फक्त त्याला आवडणाऱ्या क्षेत्राचं प्रशिक्षण देतात. सगळे एकदम science मध्ये भरत नाहीत.

अनावश्यक विषय शिकवत नाहीत.

– – चीन हा cycle प्रेमी देश ४ वर्षाच्या मुलांना cycle चालवण्याचं शिक्षण देतो. त्यानंतर theory कमी आणि प्रत्यक्ष कृती शिकवतात.

– – प्रत्येक विद्यार्थी उद्या देश चालवणार ह्याचा विचार Netherlands सारखा देशही करतो. एकाच विद्यार्थ्यावर सगळ्या विषयांचा मारा करत नाहीत. चारी दिशांनी अनेक विषय आणि क्लासचा मारा सोसण्याचे काम भारतीय विद्यार्थ्यांना करावे लागते.

 

शिक्षण काय असतं? – – 

रवींद्रनाथ टागोर काय म्हणतात पहा… 

टागोरांची “शांतीनिकेतन” शाळा झाडांखाली भरत असे. पक्ष्यांची किलबिल ऐकू येई. एकदा टागोर झाडाखाली बसले होते. चार विद्यार्थी त्यांच्या समोर पुस्तकात डोकं खुपसून बसली होती. आणि उरलेली बरीच मुले खेळत-बागडत होती. कोणी झाडावर चढला होता, कोणी फुलांचा सुगंध घेत फिरत होता.

.. तेवढ्यात एक पालक तिथे आले. पाहतात तर काय… गुरुदेव शांतपणे बसले होते आणि फक्त चार मुले पुस्तकात डोके खुपसून बसली होती व इतर मुले हसण्यात-नाचण्यात रमली होती.

सुटा-बुटातील पालक महाशय टागोरांना म्हणाले- 

“ या नाचणाऱ्या-बागडणाऱ्या मुलांच्या भवितव्याची तुम्हाला चिंता वाटत नाही का? ” 

टागोर म्हणाले—

“चिंता वाटते, पण नाचणाऱ्या-बागडणाऱ्या मुलांची नाही तर पुस्तकात तोंड खुपसून बसलेल्या मुलांची.

ही मुले खेळण्या-बागडण्याच्या वयात मोठ्या माणसांसारखी वागत आहेत. ही मुले लहान वयात प्रौढ झाली आहेत. प्रौढ तर मीसुद्धा अजून झालो नाही. खरं तर मलाही झाडावर चढावं असं वाटतं. पक्ष्यांशी बोलावंसं वाटतं. भरपूर खेळावंसं वाटतं. पण माझं शरीर आता साथ देत नाही. “

 

… टागोर जगण्यासाठी शिकवत होते. आता शिकण्यासाठी जगावे लागते. जास्त ज्ञान, जास्त कला घेऊन मुले धावत असतात.

.. आणि पालक त्यांच्यावर पैसे लावतात!

– – मग एक रेस सुरु होते..

… आणि जगायचं राहून जातं!!

लेखक : श्री नाना पाटेकर 

संकलन व प्रस्तुती – श्री सुनीत मुळे

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ ”वेगळी वाट” ☆ संध्या बेडेकर ☆

संध्या बेडेकर

? मनमंजुषेतून ?

☆ “वेगळी वाट” ☆ संध्या बेडेकर ☆

माझी ताई खूप हुशार. शिक्षण म्हंटल तर खूप नाही. पण स्मार्ट व नेहमी उत्साही, काही तरी वेगळे करणार. नेहमीच वेगळा विचार करणारी बदलत्या जगाबरोबर चालणारी “जून ते सर्वच सोनं ” असा समज व नवीन “आधुनिक सर्वच चांगलं किंवा खराब” या दोन्ही चा बरोबर विचार करून नवीन विचार मनात रुजवणे, तिला सहज जमत. एकतर विचार सरणी उत्तम, स्पष्ट, कुठेही ‘ confusion ‘नसते. तिच्या विचारात काल्पनिक भितीला कुठे जागाच नसते. जमलं तर उत्तम. नाही तर काही तरी केल्याचे समाधान. यश मिळेल, नाही तर अनुभव तर नक्कीच मिळेल ना. हा अनुभव कुठे तरी कामी येईल. असा विचार करणारी.

थोडी बिनधास्त, लोकांचा जास्त विचार न करणारी. त्यामुळे तिच्या कामात येणारे अडथळे कमी असतात. लोकांना भेटणे. त्यांचे विचार जाणून घेणे. व त्यावर विचार करणे जमते तिला. तिच्या प्रत्त्येक गोष्टी चे logic असते तिच्याजवळ. ते सांगताना भरपूर आत्मविश्वास सुंदर, योग्य शब्दात मांडणी, व आवाजात माधुर्य असतं. त्यामुळे तिचे विचार सहज पटतात. आपल्या मैत्रिणींमधे ती सर्वांची आवडती आहे. तिच्या गृप मधे विचारांना चालना देणे, दिशा देण्याचे काम ती छान करते. तिच्या घरी कामाला येणाऱ्या बायका खूप खूष असतात.  काकू!! तुमच्याशी बोलून छान वाटत. अस म्हणतात. थोडक्यात तिचे विचार पटतात.

“अहो!! असं करून बघा तर, नक्की जमेल तुम्हाला. व आवडेलही. “हे तिचं ब्रीद वाक्य.

तिचे म्हणणे, आपलं व्यक्तिमत्त्व म्हणजे आपले विचार, आपले बोलणे. तुमच्या बोलण्यात तुमचे विचार झळकतात. चेहऱ्यावर कपड्यांवर थोड्या वेळाकरिता लोक भाळतात. तुमचे कौतुक करतात. यापेक्षा चांगले सशक्त विचारांचा प्रभाव जास्त वेळ राहतो.

“Branded कपडे नसलेत तरी चालेल, Branded विचार असावेत असं ती नेहमी म्हणते. ”

विचार वेगळे असावे. नवीन असावे. थोडे चौकटीच्या बाहेर चे असावे. सर्वांना प्रोत्साहित करणारे असावे. व मुख्य म्हणजे सहज अंमलात आणता येतील असे असावे. ती ‘ वेगळी वाट ‘ नेहमी शोधावी.

कोणतीही वेगळी वाट धरायला वेगळा विचार मनात आला पाहिजे. विचार पटणारा असावा. जीवनात, आपल्या कार्य पध्दतीत सहज ‘ adjust ‘ होणारा असावा. जास्त बदलाव न करता एखादे काम करायला मन सहज तयार असते. वर्षानुवर्षे एकाच विचार पद्धतीने आपण काम करतो. अगदी रोजच्या स्वयंपाकात ही बदल करायला सुध्दा खूप जण तयार नसतात. काय माहिती आवडेल का‌? असा विचार करून ते पूढे पाऊल टाकायला धजत नाही. आणि वेगळ्या वाटेने जायची इच्छा मनात येण्याआधी सर्व दरवाजे बंद करतात.

वेगळ्या वाटेवर थोडं चालून तर बघावं. हा विचार मनात येणे म्हणजेच जून्या बंधनातून स्वतः ला मुक्त करणे आले.  वर्षानुवर्षे असलेल्या सवयीला मुरड घालावी लागेल.  तेंव्हाच नवीन काही तरी घडेल. आपल्या क्षमतेनुसार, असे प्रयोग करायला काय हरकत आहे. नवीन उर्जेचा संचार होईल. स्वतः बद्दल अभिमान वाटेल. एक चांगली गोष्ट दुसरी चांगली गोष्ट करायला प्रेरित करेल. कमी त कमी काही तरी केल्याचे समाधान मिळेल.

एकदा ताईने सांगितले. म्हणाली  मला आठवत, आम्ही थाइलॅंडला जायचे ठरविले. तेथे पॅरा ग्लायडिंग हे टूर मधे करविणार होते. जेंव्हा पासून टूरचे ‘ booking ‘ झाले होते, मी रोज म्हणायचे, मी अजिबात करणार नाही. मला नाही जमणार. पण त्यावेळेस एका सत्तर वर्षांच्या बाईंनी अगदी सहज केले. व तिला बघून मी पण केले. आणि खूप आनंद झाला. काही तरी नवीन ‘ adventure ‘केल्या मुळे आत्मविश्वास वाढला. व मागच्या दोन महिन्यांत वाटणाऱ्या काल्पनिक भिती ने मी माझा वेळ, फक्त माझाच नाही, घरच्या सर्वांचाच वेळ किती खराब केला. त्याचे वाईट वाटले. तेंव्हा पासून ठरविले कुठे ही नाही म्हणायचे नाही.

सांगायचा उद्देश हा की, उगीच घाबरणे हा स्वभाव असतो. पण स्वतःला समजाविणे हे काम केल्यास, वेगळ्या वाटेने जाणे नक्की जमेल‌.

म्हणतात ना “Age is just a number. ”

काही तरी वेगळं कोणत्याही वयात करता येत. फक्त मी काय आहे?? आणि मी काय करू शकते??? या दोन्ही मधील ‘gap’. भरता आला पाहिजे.

“आता काय झालं सर्व. , देवाने जसे आयुष्य दिले तसे जगावे. , आता या वयात काय राहील आहे? हातापायांत त्राण राहिले नाही. त्यामुळे रोजचा दिवस जसा उगवेल तसा काढायचा. “हे असे विचार म्हणजे सर्व दरवाजे बंद करणे. नवीन विचारांना डोक्यात शिरूच द्यायचे नाही. अपयशाच्या भिती ने तडजोडीचे आयुष्य जगण्यात काय मजा??”

शांत बसून दिवस घालविणे, म्हणजे जून्या घटना त्याही आपल्या बरोबर जे चूक झाले, वाईट झाले, ते उगाळत बसायचे. कारण असेच विचार मनात लगेच येतात. आपणच आपल्या विचारांना ती संधी देतो. व स्वतः ला दुःखी, असहाय समजत जातो.  .

वयामानाप्रमाणे हे सर्व होणारच आहे. पण बुध्दी जागृत आहे ना. अनुभव पाठीशी आहे. रिकामा वेळही आहे. प्रत्त्येक गोष्ट करायला धावायची गरजही नाही. तेंव्हा मी या सद्य परिस्थितीत काय करू शकते??? हा विचार मनात आला, तर दहा गोष्टी सहज सूचतात. त्यातील एक निवडून करणे. म्हणजेच वेगळी वाट शोधणे होय.

कुठे तरी वाचलेलं एक वाक्य मला खूप आवडतं

“The greatest lesson I have learned in life is that I still have lot to learn. ”

जन्मापासून शेवटच्या क्षणापर्यंत राबराब राबणे, म्हणजे आयुष्य जगणे नव्हे. स्वतः च्या समाधानासाठी, आनंदाने जगणे म्हणजे खऱ्या अर्थाने आयुष्य जगणे होय.

वयाला हरवायचे असेल तर आपले छंद जिवंत ठेवले पाहिजेत. नवीन वेगळे रस्ते शोधले पाहिजेत.

म्हणतात ना,

“आयुष्य म्हणजे मानलं तर मौज.

नाही तर आहेतच समस्या रोज. “

© संध्या बेडेकर 

वारजे, पुणे.  

7507340231

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares