मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ मोरुचा पापा… ☆ श्री मकरंद पिंपुटकर ☆

श्री मकरंद पिंपुटकर

??

☆ मोरुचा पापा… ☆ श्री मकरंद पिंपुटकर 

काल एका कामासाठी मी माझ्या गावी – उंबरगावला आलो होतो, मित्राकडे उतरलो होतो आणि आत्ता आज सकाळी त्याच्यासोबत त्याच्या घरून निघालो होतो.

निघताना, चेष्टेत मी त्याला विचारलं, “मोरुचा पापा” घेतलास ना रे? ” 

त्याचा चेहरा पडला, मला जवळजवळ खेचतच तो म्हणाला, “आधी इथून निघू या, मग तुला सांगतो. “

मी काय विचारत होतो ते तुला बहुधा कळलं नसावं, म्हणून मी त्याला समजावत म्हणालो, “अरे, हा खूप जुना शब्द आहे. मो – रु – चा – पा – पा म्हणजे मोबाईल, रुमाल, चावी, (रेल्वे / बसचा) पास, पाकीट – हे सगळं घेतलंस ना, एवढंच विचारत होतो मी !”

माझं एवढं बोलणं होईपर्यंत, लिफ्टने आम्ही इमारतीच्या तळमजल्यावर आलो होतो, आतापावेतो तो थोडा relax झाला होता. म्हणाला, “अरे हो, मला ठाऊक आहे मोरुचा पापा म्हणजे काय ते. मोबाईल येण्यापूर्वी यालाच पेरूचा पापा म्हणत – पे म्हणजे पेन अशा अर्थाने. पण, तू हा प्रश्न विचारलास तेव्हा बायको जवळच होती, तिने माझ्या विसरभोळेपणाबद्दल प्रवचन दिलं असतं, आणि मोरुचा पापा काय, मीच कसा मोरू आहे हे तुला सांगितलं असतं, म्हणून मी तुला तिथून अर्जंट बाहेर काढलं. “

त्याच्या या स्पष्टीकरणाने मी आणखीनच गोंधळात पडलो. माझ्या चेहऱ्यावरचे भाव पाहून तो मला समजावून सांगू लागला.

– – “गेल्या वर्षीची गोष्ट. कंपनीच्या कामासाठी मला मुंबईहून विमानाने चेन्नईला जायचे होते. (उंबरगाव हे पश्चिम रेल्वेवर, मुंबई अहमदाबाद रेल्वेमार्गावर गुजरातमधील पहिले रेल्वे स्टेशन आहे. मुंबईपासून साधारण १५० किलोमीटर दूर) महत्त्वाचे presentation होते आणि साहेबांनी माझ्यावर ही जबाबदारी टाकली होती.

मुंबईहून सकाळी ११:३० ची फ्लाईट होती, उंबरगावहून सकाळी ६ वाजताच्या वलसाड पॅसेंजर ट्रेनने निघावे लागणार होते, म्हणजे ८:३० पर्यंत बोरिवली णि तिथून रिक्षाने विमानतळ गाठायचा होता.

झ्या बायकोला एक चांगली सवय आहे. मला असं लवकर निघायचं असलं की, सकाळच्या घाईगडबडीत काही राहायला नको म्हणून, आदल्याच दिवशी, माझी बॅग भरून ती दाराशीच ठेवते. त्याप्रमाणे तिने माझ्या दोन्ही बॅग्स दाराशीच ठेवल्या होत्या. एक लॅपटॉपची बॅग – ज्यात विमानाचे तिकीटही होते आणि दुसरी बॅग – जिच्यात माझे कपडे, कंपनीची कामाची कागदपत्रं होती. कंपनीने मला हातखर्चासाठी पन्नास हजार रुपये रोख देऊन ठेवले होते, तेही याच दुसऱ्या बॅगेत होते.

सकाळ झाली. मी आन्हिके आटोपून, बायकोने दिलेला गरमागरम चहा पिऊन निघालो. स्टेशनला पोचलो, दहा पंधरा मिनिटांत गाडी आली, बसायला जागा मिळाली, स्थिरस्थावर झालो, गाडीने वेग पकडला, आणि… ” मित्र सांगताना थबकला, आत्ताही हे सांगताना त्याच्या कपाळावर घाम आला होता.

“… आणि माझ्या लक्षात आलं की माझ्या हातात फक्त लॅपटॉपचीच बॅग आहे, माझी कपड्यांची दुसरी बॅग माझ्याकडे नाहीये. मला दरदरून घाम फुटला. मी घरून तर दोन्ही बॅगा घेऊन निघालो होतो. का दुसरी बॅग घरीच राहिली होती?

मी बायकोला फोन लावला. थंडी होती, आज कामाची काही धावपळ नसल्याने ती पांघरुणात मस्त गुरफटून झोपली असणार, झोपमोड केल्याबद्दल ती रागावणार हे ठाऊक होतं, पण पर्याय नव्हता, मी तिला फोन केला.

बराच वेळ रिंग वाजल्यावर पेंगुळलेल्या आवाजात तिनं फोन उचलला. पण माझा प्रश्न ऐकल्यावर तिची झोप पार उडाली. “तू घेतल्या होत्या दोन्ही बॅगा, ” तिने ठामपणे सांगितलं, “पण, थांब क्षणभर, मी खात्री करून घेते, ” ती म्हणाली. दोन सेकंदांत ती पुन्हा फोनवर आली – इथे घरात नाहीये तुझी बॅग, तू नक्की घेऊन गेला आहेस दोन्ही बॅगा. ” तिने ठामपणे सांगितलं.

मी फोन ठेवला. डोक्यात नुसतं वादळ उठलं होतं… ती बॅग स्टेशनावरच राहिली का? का गाडीत चढताना कोणी चोरली?

सगळ्यात मोठा प्रश्न होता – आता काय करायचं? त्या दुसऱ्या बॅगेतल्या कागदपत्रांशिवाय चेन्नईतील माझी मीटिंग शक्य नव्हती. विमान पकडले नाही, चेन्नईला गेलो नाही, तरी फटके होते, शिवाय कंपनीने दिलेल्या पैश्यांचे काय? .. अनेक विचारांनी डोकं नुसतं भंडावून गेलं होतं.

एवढ्यात माझा फोन वाजला, बायकोचा फोन होता, आवाजावरून तिची झोप पूर्णपणे उडाल्याचं स्पष्ट जाणवत होतं. “बाबा रे, तुझी बॅग मिळाली. घराबाहेर लिफ्टसमोर विसरला होतास तू. ” या दोन वाक्यांव्यतिरिक्त तिला अजून बरंच काही सुनवायचं होतं, पण ती संयम बाळगून होती, हे मला जाणवत होतं.

.. माझ्या डोक्यात चक्रं फिरू लागली.

थोड्या वेळाने, ६:३० च्या सुमारास, मी ज्या गाडीत होतो ती वलसाड पॅसेंजर ट्रेन डहाणूला पोचणार होती. डहाणूला मी जर उतरलो, तर तासाभराने, ७:३० वाजता पुढची ट्रेन – फ्लाईंग राणी एक्सप्रेस येणार होती. ही गाडी अंधेरीला – बोरिवलीपेक्षा विमानतळाच्या जास्त जवळच्या स्टेशनला – सकाळी ९:१५ वाजता पोचणार होती, तिथून मला चेन्नईचं विमान पकडणं तांत्रिकदृष्ट्या तरी शक्य होतं.

मी बायकोला म्हटलं, “ती बॅग घे, रिक्षा पकड, आणि डहाणूला ये. मी फ्लाईंग राणी पकडतो आणि पुढे जातो. “

बायको निघाली. आधी आमच्या घराजवळून तिला डहाणूला जायला रिक्षा मिळेना, मग ती पहिल्या रिक्षाने “अकरा मारुती” स्टॉपला पोचली. तिथे तिला डहाणूसाठीची रिक्षातर मिळाली, तो अव्वाच्या सव्वा भाडं मागत होता, पण मौके की नजाकत देखते हुवे तिने ते भाडं मान्यही केलं. पण एवढं झाल्यावर डहाणूच्या दिशेने सुसाट निघण्याऐवजी, हातात पैसे पडल्यावर, त्या रिक्षावाल्याने मोर्चा फिरवला तो cng पंपाकडे.

तिकडे बायको आणि इकडे मी घड्याळावर नजर खिळवून होतो. रिक्षा एकदाची आता डहाणूच्या दिशेने निघाली होती. दरम्यान मी आमच्या कंपनीतल्या डहाणूला राहणाऱ्या राजूला फोन केला. त्याला थोडक्यात हे सगळं सांगितलं, आणि डहाणू रिक्षा स्टँडवर त्याला तयारीत राहायला सांगितलं.

गाडीची वेळ झाली, तरी अजून बायको आणि रिक्षा पोचल्या नव्हत्या. राजूचा मला फोन आला, तो म्हणाला, “ट्रेन आलीच तर तुम्ही चढा आणि opposite बाजूच्या दरवाज्यात येऊन उभे रहा. ” 

माझी ट्रेन २ क्रमांकाच्या फलाटावर येणार होती आणि रिक्षा १ क्रमांकावर. नियमानुसार राजूने जिने चढून २ क्रमांकाच्या फलाटावर येणं अपेक्षित होतं, पण तो बहुधा रुळांवरून उड्या मारून येणार होता.

इकडे फलाटावर गाडी आली, आणि तिकडे रिक्षा डहाणू स्टेशनच्या स्टँडवर शिरली. राजूचा मित्र तिथे तयारीत उभा होताच. रिक्षा थांबण्यापूर्वीच त्याने बायकोकडून बॅग ताब्यात घेतली आणि तो फलाटाकडे धावला. इकडे मी ट्रेनमध्ये चढून दरवाज्यात येऊन उभा राहिलो.

राजूने बॅग घेतली, फलाटावरून रेल्वे रुळांवर तो झेपावला, गाडी हलली होती, बॅग उंचावत तो माझ्या दाराकडे आला, मी बॅग ताब्यात घेतली आणि सुस्कारा सोडला.

मी आत येऊन जागेवर बसलो, पाच मिनिटं झाली तरी माझ्या छातीत अजून धडधडत होतं. श्वास थोडा नियमित झाल्यावर मी आधी बॅग तपासली. पैसे, कागदपत्रं सगळं व्यवस्थित होतं. मी बायकोला फोन लावला.

ती अजून घुश्श्यात होती. दोन मिनिटं तिनं आधी तिची सगळी भडास काढली, आणि शेवटी म्हणाली, “आता यापुढे तू, तुझी बॅग आणि तुझा विमानप्रवास याबाबत पुन्हा फोन केलास, तर मी काही तो फोन उचलणार नाही. “

तर अशी ही माझ्या विसरभोळेपणाची कथा. तू तो मोरूच्या पाप्याचा प्रश्न विचारून जखमेवरची खपलीच काढत होतास, म्हणून तुला मी घाईगडबडीनं बाहेर काढलं. “

तो सांगत होता, मी त्याचा चेहरा पाहत होतो, आणि खरंच, तो आत्ता अगदी मोरूच दिसत होता.

© श्री मकरंद पिंपुटकर

चिंचवड

मो ८६९८०५३२१५   

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ माझ्या आर्मी लाईफची एक झलक… ☆ सुश्री संध्या बेडेकर ☆

सुश्री संध्या बेडेकर

? मनमंजुषेतून ?

☆ माझ्या आर्मी लाईफची एक झलक… ☆ सुश्री संध्या बेडेकर ☆

“हा लेख सेनेच्या सर्व Lady Wives ना समर्पित करते.”  

“Proud To Be A Wife Of an Indian Soldier.” 

आज आम्ही सर्व बहिणी एकत्र जमलो होतो. आमचे स्पेशल गेटटूगेदर होते. ताईच्या घरी नुकतेच renovation झाल्यामुळे घर मस्त दिसत होते. आता त्यांनी वयाच्या व सवयींच्या अनुरूप घरात चेंजेस केले होते. ••••

ताई म्हणाली, •••

अग!! तीस वर्षे झाली. लग्नानंतर काही वर्षांनी आम्ही या घरात रहायला आलो. तेच ते बघून बघून कंटाळा आला होता. मुलांची शिक्षण, लग्न सर्व याच घरात झाली. ••••

मी हसले, •••तर ताई म्हणाली, ••• का ग? कशाला हसलीस?? ••••

मी म्हंटल, ••• अग!! या तीस वर्षांत तर मी अक्षरशः अर्ध्या भारतभर फिरले. या अवधीत किती घर बदलली??? मुलांच्या किती शाळा बदलल्या??? मोजावेच लागेल मला. •••

आता मात्र सर्वांची उत्सुकता वाढली. ••••

‘आर्मी लाईफ ‘ वेगळेच असते. त्याबद्दल जाणून घ्यायची उत्सुकताही असते. काही समज गैरसमज ही असतात. आज सर्वांनी आग्रह केला, म्हणून मी त्यांना माझ्या तीस वर्षांहून जास्त आर्मी लाईफचा अनुभव सांगायला सुरुवात केली. •••••

मी म्हंटल, •••••

लग्नानंतर सामान्यतः एका स्त्री चे आयुष्य म्हणजे तिचा नवरा, त्याची नोकरी, मुले त्यांचे शिक्षण, घर सांभाळणे. प्रामुख्याने हेच तिचे विश्व असते. नवऱ्याच्या नोकरीवर तिचे आयुष्य अवलंबून असते. दोघांनी मिळून घराकडे लक्ष द्यायचे. हा एक साधारण अलिखित करार असतो. ••••

परंतु ‘आर्मी ऑफिसर’ बरोबर लग्न झाल्यावर हे समीकरण थोडं बदलत. कारण 

” An Army man is on duty for 24 hours. “••••

येथे ‘No ‘ शब्द चालतच नाही. It is always ‘YES ‘ and only ‘YES. ‘ •••

नोकरी बरोबर मधून मधून कोर्सेसही असतात. युद्ध व्हाव अस कधीच कोणाला वाटत नाही. पण झालंच तर तुमची तयारी असावी. म्हणून “जीत का मंत्र ” द्यायला,

“लक्ष्य की ओर हमेशा अग्रसर ‘ रहायला ‘physically mentally toughness’ जागृत ठेवायला, वेगवेगळे कोर्सेस होत राहतात. कोणत्याही वेळेस युद्ध जिंकायला तयार असणे. याची तयारी होत असते. ••••

” Actually, Any army personnel is paid for this day only. ” ••••

” आधी देशाचे काम मग घरचे. ” हा साधा सरळ हिशोब असतो. ••••

हे सर्व नोकरीत रुजू व्हायच्या आधी माहीत असतंच. ही नोकरी करणे तुमचा ‘choice’ असतो. तुम्हीच ठरविलेले असते. आर्मी ऑफिसर शी लग्न झाल्यावर का?? कशाला?? मीच का?? असे प्रश्न उद्भवतच नाही. •••••

म्हणून बायकोची जबाबदारी वाढते. ••••

आता थोडं माझ्या बद्दल म्हणजे जनरल ‘army wives ‘ बद्दल सांगायचे झाले तर थोडया फार फरकाने सर्वांची स्टोरी मिळतीजुळतीच असते. ••••••• 

रिटायरमेंट नंतर, सध्या ज्या घरात मी पर्मनंट राहते आहे, ते माझ्या आयुष्यातले ‘वीसावे’ घर आहे. म्हणजे आजपर्यंत मी

वेगवेगळ्या शहरात वेगवेगळया घरात राहिले. कधी दहा खोल्यांचा जून्या ब्रिटिशकालीन बंगल्यात, तर कधी अगदी दोन खोल्यांचे घर.

प्रत्त्येक ‘ posting ‘ मधे अशीच तयारी करायची की, कुठेही सहज राहता येईल. स्वयंपाक करता येईल. म्हणजे प्रत्येक posting मधे ‘mini ‘ संसाराच्या चार पेट्या तयार करायच्या. व वेळ निभावून घ्यायची. ” स्वयंपाक, शाळा, अभ्यास “या तीन गोष्टींना प्राथमिकता द्यायची व नवीन जागी लवकरात लवकर ‘ adjust ‘ व्हायचा प्रयत्न करायचा. आमच्या ‘comfort’ ची व्याख्या खूप सीमीत होती. •••••

प्रत्त्येक ‘ posting ‘मधे दोन तीन पेट्या वाढायच्याच. असं म्हणतात, ••• पेटयांचा टोटल नंबर मोजून आर्मी ऑफिसर ची ‘Rank’ व एकंदर किती’ postings ‘ झाल्या ते कळत. आम्ही रिटायर्ड झालो, तेंव्हा ‘सत्तर’ पेटया होत्या. म्हणजे नोकरीच्या पस्तीस वर्षाचा आमचा संसार त्या जीवाभावाच्या पेट्यांमधे होता. ••••

तुमचे विचार खूप स्पष्ट असले, तर तुम्ही तुमचे आयुष्य छान प्लान करू शकता. आम्हाला या नोकरीचे प्लस मायनस points माहीत होते. म्हणून आम्ही आधीच ठरविले की व्यवस्थित रहायचे. मग पेटयांचा नंबर वाढणारच. त्या टिपिकल काळया लाकडी पेट्या खूप कामाच्या होत्या. त्यांनी आयुष्यभर खूप इमानदारीने आमची साथ दिली. कधी पलंग, तर कधी setty. आवश्यकतेनुसार त्यात सामान ठेवून वेळोवेळी काळया पेटयांची मदत झाली. ••••

आता मुलींच्या शिक्षणाबद्दल सांगायचे झाले तर, माझ्या मुलीने बारावी पास होईपर्यंत बारा शाळांमधून शिक्षण घेतले. म्हणजे साधारण प्रत्त्येक वर्षी •••नवीन शाळा, शिक्षक, मित्र मैत्रीणी बदलायच्या. प्रत्त्येक नवीन जागी स्वतःला प्रूव्ह करायचे. बर, हे सर्व वर्ष सुरू होण्यापुर्वीच होईल असे नाही. एकदा तर ‘ half yearly ‘ परीक्षेच्या एक दिवस आधी अॅडमिशन घेतली. दुसऱ्या दिवशी पासून सुरू होणाऱ्या परीक्षेचे सिलेबस व रोल नंबर घेऊन घरी आलो. ‘उधमपूर ‘ ‘जम्मू काश्मीर’ मधील‌ ही नवीन जागा, ती पण पहाडी, शाळेत admission साठी जाताना एक मुलगी रडली व येताना दुसरी. व त्यात आणखी भर‌, म्हणजे त्यांचे बाबा आमच्या बरोबर नवीन जागी नव्हते. वेळेवर काही कारणाने त्यांना थांबावे लागले. मी मुलींना घेऊन उधमपूर ला पोचले होते. मला तो दिवस चांगला आठवतो. त्यादिवशी दोघींनी दहा बारा तास अभ्यास करून दुसऱ्या दिवशी च्या परीक्षेची तयारी केली होती. कारण सिलेबस वेगळा होता. •••

आर्मी मध्ये नेहमी नवऱ्या बरोबर राहता येईलच, असे नसते, Field posting’ मधे फॅमिलीला बरोबर राहता येत नाही. म्हणून अशा तडजोडी करण्याशिवाय दुसरा पर्याय नसतोच. यात एकच खंत वाटते की अगदी लहानपणापासूनचे बरोबर शिकलेले मित्र मैत्रीणी माझ्या मुलींना नाहीत. •••

यातही एक सकारात्मक विचार असा की •••• प्रत्येक नवीन स्टेशन वर, नवीन मुलांमध्ये, पहिल्या ‘पाच ‘ मधे तुम्ही आपली पोझिशन मेन्टेन ठेवली, तर‌ आयुष्यात पूढे द्याव्या लागणाऱ्या ‘competitive ‘ परीक्षेची तयारी आपोआपच होत जाते. मुलेही टफ लाईफला सामोरे जायला हळूहळू शिकतात. हे सर्व खूप सोप्प नक्कीच नव्हतं, पण दुसरा पर्याय ही नव्हता. बरे असो, याचा प्रभावी परिणाम आता दिसतोय. सर्वांना कुठेही सहज adjust होता येत. ••••

आर्मी म्हणजे एक ‘स्टाइल ‘आहे. एक ‘standard ‘आहे. ‘Status ‘ आहे. बायकांचा ‘ड्रेसिंग सेन्स’ छान असतो. खूप काही नसतानाही ‘limited budget ‘ मधे‌ व्यवस्थित राहणे जमते त्यांना. ‘clean and organised home ‘ ही विशेषता असते त्यांची. Quality of life is v good. वेळेचे महत्व, attiquett manners, junior-senior respect एक protocol असतो. तो पाळायचाच असतो. अनुशासन कडक असते. ••••

lunch \ dinner party चे एक ‘स्टेटस’ असते. एक ‘पद्धत’ असते. तेथे मराठी पणा बाजूला ठेवूनच वागावे लागते. बायकांना खूप मान असतो. म्हणजे अगदी ज्युनिअर आॅफिसरच्या बायकोच्या वेलकम साठी सिनीयर मोस्ट आॅफिसर सुद्धा उभा राहतो. आर्मीत कोणत्याही ‘official ‘ फंक्शन ला seniority व rank च्या हिशोबाने यायची वेळ दिली जाते. ••••

आर्मी म्हणजे एक असे ‘organization’ आहे, जेथे तुमचा ‘personality development program ‘ सतत सहज सुरूच असतो. नवीन जागा, नवीन माणसे, पण त्या त्या शहराचे कल्चर तुम्हाला अनुभवायला मिळते. वेगवेगळे प्रसंग बघून तुमचे व्यक्तिमत्त्व खुलते, बहरते. विचारांची रेंज वाढते. Priorities बदलतात. बायकांना बऱ्याच activities मधे भाग घ्यावा लागतो.

Ladies club, AWWA म्हणजे ‘Army Wives Welfare Association ‘जेथे आम्ही Unit च्या सर्व बायका एकत्र जमतो. काही तरी नवीन शिकतो, शिकवतो. •••

म्हणतात ना, ••••

” जिंदगी खट्टी मीठी होनी चाहिए ।”•••

आर्मीवाल्यांना फक्त खट्टा मीठा च नाही तर, सर्व प्रकारचे अनेक स्वाद सहज चाखायला मिळतात… आजही किती तरी प्रसंग मनावर कोरले गेले आहेत. ••••

ताई म्हणाली, •••सगळयात कठीण posting / वेळ कोणती होती ग??? ••••

मी म्हंटल, ••• अग!!! अंदमान, नागालँड सिक्कीम या थोड्या वेगळ्या postings होत्या. अंदमान ला शाळा फक्त नावालाच होती. •••••

मी जो कठीण काळ बघीतला, तो म्हणजे ‘कारगिल युद्ध ‘. त्यात यांचा सहभाग होता. ते चार महिने हे नक्की कुठे आहेत?? हेही माहीत नसायचे. सर्व पत्रांची ‘ scrutiny ‘ व्हायची. तेंव्हा मोबाईल वगैरे वापरायची परवानगी नसतेच. प्रत्त्येक आठवड्यात एक ऑफिसर पंचवीस किलोमीटर दूर जाऊन आपल्या घरी फोन करून सर्वांची खुशाली कळवत असे. TV वरील रोजच्या बातम्या ऐकून जीव खालीवर व्हायचा. यावेळेस आपली जबाबदारी जास्त आहे, हेही समजत होतच. मुलींकडे लक्ष देणे, त्यांना सांभाळणे हे महत्त्वाचे काम होते. मुलींनी मात्र खूप साथ दिली. विचलित न होता धैर्याने प्रत्त्येक जण आपले काम करत होता. या परिस्थितित माझी responsibility फक्त माझे घरच नाही तर, ‘Unit ‘ च्या इतर families ला सांभाळणे ही पण होती. Unit च्या बायकांना मानसिक आधार देणे. त्यांचे छोटे मोठे प्रश्न सोडविणे, मुलांच्या आजारपणात त्यांची मदत करणे. ही पण जबाबदारी होतीच. ••••.

मी कधी युनिफॉर्म घातला नाही. हातात बंदूक घेतली नाही. परंतु मी silently गोळ्यांचा आवाज ऐकला आहे. मी आर्मी लाइफ जगले आहे, अनुभवली आहे. या नोकरीने आयुष्यात सर्व रंग दाखविले. चांगले -वाईट अनुभव, उतार चढाव बघितल्याने आता कोणत्याही परिस्थितीत आम्ही ‘मजेतच’ असतो. कोणत्याही परिस्थितीला सामोरे जायची हिम्मत ठेवतो. ••••

We do not grow, when things are easy.

We grow when we face challenges.

Life is not a bad story, sometimes you read a bad chater. That’s it.

आजही युनिफॉर्म घातलेला कोणी दिसला की आनंद होतो. सख्खा नातेवाईक भेटल्या सारखे वाटते. आमचे ‘ते ‘ दिवस पुन्हा एकदा नजरेसमोरून जातात. उर्जा वाढते. ••••

‘Challenges ‘ प्रत्त्येकच नोकरीत असतात. काम कोणतेही सोपे नसतेच. प्रत्त्येक जण आपापल्या परीने सेवा /मदत करतोच. तरीही आर्मीत नोकरी करायची आवड / aptitude असावा लागतो. उगीच ओढून ताणून ही नोकरी करता येत नाही. ••••

ही नोकरी म्हणजे, •••

” It’s different. “•••

‘uniform ‘ची एक ‘grace’ असते ‘वजन’ असतं. घालणाऱ्या च्या चेहऱ्यावर जबाबदारी पेलायचा ‘आत्मविश्वास ‘असतो. •••

“मैं हुं ना ” चे आश्वासन चेहऱ्यावर दिसते.

अनेक वर्षापुर्वी चां तो दिवस मला आजही आठवतोय, जेंव्हा आम्ही भेटलो होतो तेंव्हा, ••••••

“I asked him, ••• how much do you earn??

He said, ••• roughly hundred salutes a day. And we got married. ” “•••••

मला लग्नात मिळालेला सर्वात मुल्यवान दागिना म्हणजे तो ‘green uniform ‘व त्यावर त्यावेळी लागलेले ते तीन *STARS* *** होते. त्यांची किंमत आखणारे किंवा ‘purity ‘ चेक करणारे मशीन कोणत्याही सोनाराजवळ नाही. ••••

वयानुसार केस पांढरे होत गेले व खांद्यावरील * STARS * वाढत गेले. जेवढ नशीबात होत तेवढं मिळाल. पैशापेक्षा अनुभवाने श्रीमंत झालो आम्ही. एकाच जन्मात किती तरी बघायला मिळालं. अगदी रिटायर्ड व्हायच्या थोडे दिवस आधी ‘लेह लडाख ‘ मधे झालेल्या ‘ढग फूटी’ च्या वेळेस मेडीकल कव्हर द्यायला हे गेले होते. ••••

‘फूल नाही पण फूलाची पाकळी ‘एवढे आपले योगदान देऊन आम्ही ‘समाधानाने’ व ‘अभिमानाने ‘ रिटायर्ड झालो. •••

या जन्मात आर्मी ऑफिसर च्या ‘बायकोची’ भूमिका होती. पूढच्या जन्मात ही हीच भूमिका करायला मला नक्की आवडेल. •••

आज मन किती तरी जागी फिरून आले. खूपदा डोळे भरून आले. •••

माझ्या बहिणींच्या चेहऱ्यावरील मिश्रित भाव मी वाचू शकत होते.. ••••

” Proud To Be a Wife of an Indian Soldier. “••••

•••• ‘जय हिंद’ ••••

© सुश्री संध्या बेडेकर 

वारजे, पुणे.  

7507340231

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ मनामनातील वेताळ… लेख क्र. ५ ☆ श्री संदीप सुंकले (दास चैतन्य) ☆

श्री संदीप सुंकले (दास चैतन्य) 

? मनमंजुषेतून ?

☆ मनामनातील वेताळ… लेख क्र. ५ ☆ श्री संदीप सुंकले (दास चैतन्य) 

चंद्रशेखर गोखले यांची एक चारोळी आहे.

*”घर दोघांचे असते, ते दोघांनी सावरायचे असते, एकाने पसरले तर दुसऱ्याचे आवरायचे असते…!! “*

सध्या मुलामुलींची वाढती वये आणि त्यांचे विवाहसंबंधीचे त्याचे आधुनिक विचार आपल्याला विचार करायला लावतात…

कोणताच विचार वाईट नसतो, जोपर्यंत तो आचरणात येत नाही, अर्थात त्याचे बरेवाईट परिणाम आपल्याला कळत नाहीत…

पारंपरिक विवाहपद्धतीतील सर्व दोष आधुनिक विवाह पद्धतीमुळे पूर्णपणे नष्ट झाले असे म्हणता येत नाही. सध्या तरुण पिढी नवनवीन प्रयोग करून पहात आहे. विवाह संस्था कधी अस्तित्वात आली हे सांगणे अवघड आहे. पण आज जसे त्याबद्दल नवनवीन प्रयोग होत आहेत, मागील काळात अनेक वेळा झाले असतील असे म्हणायला संधी आहे. कारण येणाऱ्या पुढील पिढीस मागील गोष्टी रुचत नसतात, त्यामुळे आपण ज्याला पारंपरिक विवाह पद्धती म्हणतो, ती अशा अनेक स्थित्यंतरातून हा स्थितीत आपल्या हाती आली असेल, पहा हा तर्क रुचतोय का?

सध्याच्या काळात विवाह करण्याच्या वेळी उपवर मुलामुलींच्या असलेल्या अपेक्षा पाहिल्या की या मुलांना पैशाशी लग्न करायचे आहे की ब्लॉकशी, त्या संबंधित मुलाशी लग्न करायचे आहे की त्याच्या स्टेटसशी, मुलीशी लग्न करायचे आहे की ती कमवून घरी आणणाऱ्या पैशाशी? असे अनेक प्रश्न आपल्याला पडतात…! एका विशिष्ट मर्यादेपर्यंत ते योग्य असतीलही, पण वेळा काळ पाहून विवेकाने शक्य ती तडजोड केल्याशिवाय विवाह होऊच शकणार नाहीत. पूर्वी सुद्धा लोकं अशा तडजोडी करीतच होते…

माझी एक विनंती आहे. विवाह करताना मुलगा अथवा मुलगी कोणीही असो, दोघांनी आपलं वय, आपली एकूण कुवत, आपल्या घरातील एकूण वातावरण, आपला स्वभाव, आपली समज, याचा विचार करून आपल्याला अनुरूप असण्यापेक्षा, आपल्या स्वभावाला, संस्कारांना आणि भावी आयुष्याला अनुकूल ठरेल असा जोडीदार निवडण्याचा प्रयत्न करावा…

एक भारतात घडलेली सत्य घटना सांगतो…

*एका तरुणाने पण जिंकून राजकन्येला वरले. आणि आपल्या घरी घेऊन आला. जगात नाव असलेल्या घराण्यात मुलगी नांदायला आली. काही दिवस गेले न गेले, त्याचा राज्याभिषेक ठरला, पण लक्ष्मी नारायणाची जोडी असतानाही त्या दोघांना वनवासात जावे लागले, ज्या मुलीने कधीही दुःख नावाचा प्रकार अनुभवला नव्हता, तिला जंगलातून अनवाणी चालावे लागले, कायम मौल्यवान वस्त्रे, अलंकार परिधान करणाऱ्या राजकन्येला वल्कले परिधान करावी लागली… *

*आपल्या सर्वांच्या मनात असलेल्या प्रभू श्रीराम आणि सीता माते बद्दलच बोलत आहे… *

*अहो, जिथे रामाला वनवास चुकला नाही, तर आपल्या सारख्या सामान्य जनांचे काय होणार…? *

त्यामुळे मनुष्याने आपल्याला चांगला जोडीदार. चांगली सून, चांगला जावई मिळण्यासाठी आवश्यक ते प्रयत्न जरूर करावेत, अतिरेकी अट्टाहास करू नये. याउलट, विवेकाने योग्य वयात, अनुकूल जोडीदार पाहून विवाह करावा, बाकीच्या *वेताळांना* आपल्या मनात शिरू देऊ नये…!!

पहा पटतंय ना?

– लेख क्र. पाचवा 

© श्री संदीप सुंकले (दासचैतन्य)

मो. 8380019676

 ≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ “aftereffects – तिळगुळ घ्या गोड बोला…” ☆ श्री सुधीर करंदीकर ☆

श्री सुधीर करंदीकर

??

☆ “aftereffects – तिळगुळ घ्या गोड बोला…” ☆ श्री सुधीर करंदीकर

साईड इफेक्टस् हा शब्द आपल्या सगळ्यांच्याच परिचयाचा आहे. कुठल्यातरी ऍलोपॅथिक औषधाशी आपली सगळ्यांची मैत्री ही असतेच असते आणि त्यामुळे त्यांचे साईड इफेक्ट पण आपण सहन करत असतो.

त्याचप्रमाणे काही गोष्टींचे आफ्टर इफेक्टस् हे पण खूप छान असतात, असा अनुभव कधी घेतला आहे का? मला असा अनुभव आज आला.

काल आपण सगळ्यांनीच संक्रांत सण आनंदात साजरा केला, तिळगुळ घ्या गोड बोला याची भरपूर देवाण-घेवाण झाली.

आजचा माझा अनुभव –

नेहमीप्रमाणे सकाळी फिरायला बाहेर पडलो. रस्त्यात बऱ्याच जणांचे / जणींचे हात हलवून नमस्कार नेहमीच होत असतात. आज चक्क सगळेजण थोडा वेळ थांबून आणि अतिशय गोड बोलून चौकशी करत होते. आज सगळेजण चक्क एवढे गोड का बोलत आहेत हे काही लक्षात येईना.

नेहमीप्रमाणे सकाळी बऱ्याच जणांशी फोनवर बोलणे झाले, गप्पा झाल्या. आज चक्क सगळे इतके गोड बोलत होते, कि, विश्वासच बसत नव्हता.

घरामध्ये सकाळी चहा देताना आणि नाश्ता देताना बायकोच्या बोलण्यात पण एक छानच गोडपणा जाणवत होता.

आज सगळेजण इतके गोड का बोलत आहेत, यावर विचार करत होतो आणि पटकन ट्यूब पेटली.

काल संक्रांत सणाला मी सगळ्यांना तिळगुळ घ्या गोड बोला- आज गोड बोला आणि रोजच गोड बोला, अशा शुभेच्छा दिल्या होत्या. फोन वरती ओळखीच्यांना ई तिळगुळ देऊन अशाच शुभेच्छा दिल्या होत्या. त्याचाच हा परिणाम असणार हे नक्की.

मी वर बघून संक्रांत देवीला नमस्कार केला आणि प्रार्थना केली – सगळ्यांच्या एकमेकांशी बोलण्यात वागण्यात असाच गोडवा आणि गोडपणा पूर्ण वर्षभर म्हणजे पुढच्या संक्रांत सणापर्यंत राहो, आणि हा गोडवा मनापासून असावा, असे तुझे आशीर्वाद सगळीकडे असू देत…

आणि मी पण सगळ्यांकडून तिळगुळ घेतला आहे, तेव्हा मी पण नक्कीच पूर्ण वर्षभर सगळ्यांशी गोडच बोलणार, आणि अगदी मनापासून गोड बोलणार.

आणि चक्क संक्रांत देवीने ‘तथास्तु’ असा आशीर्वाद दिला.

© श्री सुधीर करंदीकर

मो. 9225631100 – ईमेल – srkarandikar@gmail. com

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ माझी जडणघडण… – थरारक पर्यटन – भाग – ७५ ☆ सौ राधिका भांडारकर ☆

सौ राधिका भांडारकर

??

☆ माझी जडणघडण… – थरारक पर्यटन – भाग – ७४  ☆ सौ राधिका भांडारकर ☆

(सौजन्य : न्यूज स्टोरी टुडे, संपर्क : ९८६९४८४८००)

थरारक पर्यटन

मला नेहमी असं वाटतं की एखादा प्रवासी किंवा एखादा खेळाडू यांच्या मानसिकतेत साम्य आहे. दोघेही खिलाडू वृत्तीचे असतात, परिस्थितीशी जुळवून घेणारे असतात, कठीण परिस्थितीचं दोघांनाही भान असतं, अडचणींवर मात करण्याची क्षमता त्यांच्यात आपोआपच बळावते, माघार घेण्याची वृत्ती त्यांच्यात अभावाने जाणवते.

ग्रुप बरोबर केलेल्या अनेक टूर्समधून मी हा अनुभव घेतला आहे. सत्तरी उलटून गेलेली, ऐंशीच्या उंबरठ्यावर असलेली माणसे अगदी हौसेने उंच चढणी चढतात, कितीतरी किलोमीटर चालण्याची त्यांची तयारी असते. नव्या प्रदेशातील अनोळखी खाद्य संस्कृतीही अगदी आनंदी वृत्तीने, खिलाडू वृत्तीने स्वीकारतात, उगीच”खाण्याचे हाल होत आहेत” वगैरे कुरकुर करत बसत नाहीत. या संदर्भात मला एका हास्यास्पद प्रसंगाची आठवण येते.

तेव्हा आम्ही इटलीत फिरत होतो. इटालियन पिझ्झा हा जगप्रसिद्ध. मूळात “पिझ्झा” हे इटालियन लोकांचेच खाणं. तेव्हा इटलीत आलोय तर इटालियन क्यूझीनची चव का घेऊ नये? आमच्या ग्रुप कंडक्टरने आम्हाला इटालियन रेस्टॉरंट मध्ये नेलं आणि सगळ्यांसाठी “पिझ्झा” ची ऑर्डर दिली. आमच्याबरोबर एक वृद्ध गुजराती महिला होती. मुख्य म्हणजे ती एकटीच या टूर बरोबर आली होती. तिच्याबरोबर घरचे, अथवा स्नेही कुणीच नव्हते आणि तिच्याशी गप्पा करतानाच समजले की, ” ती नेहमीच एकटीच प्रवास करते. ” सिंगल ट्रॅव्हलर. तिचं म्हणणं, “टूर मध्ये सोबत मिळतेच आता नाही का तू भेटलीस मला. ” त्या संवादानंतर मी हळूच स्वतःलाही जरा तपासून पाहिलं, “आपल्याला जमेल का असे एकटीनेच फिरायला. मूळात आवडेल का? ” उत्तर अर्थातच “कोण जाणे! ” असंच आलं.

तर सांगत होते सगळ्यांच्या टेबलवर छान रंगीबेरंगी टोमॅटो, बेल पेपर्स, आॉलीव्ह्ज, भरपूर चीज वगैरेंनी सजवलेले पिझ्झा आले. “वा! वा! साक्षात इटालियन पिझ्झा! ”

त्या वृद्ध महिलेनेही तो खाण्यासाठी कापायला सुरुवात केली. तो इतका चिवट होता की तिने थोडासा सुरीवर जोर लावल्याबरोबर एखाद्या विटी सारखा टणकन् उडून दुसऱ्या टेबलवर जाऊन पडला. मला हे आठववून लिहिताना आताही खूपच हसू येत आहे.

“जो मारो पिझ्झा क्याथी गयो! ”

ती मजेत बोलत होती. थोड्याफार प्रकाराने सगळ्यांच्याच बाबतीत हा चिवट पिझ्झा खायचा कसा हा प्रश्नच होता. काहीजण ग्रुप कंडक्टरकडे तक्रारही करू लागले पण ही वृद्ध गुजराती महिला मात्र अगदी शांत होती.

“एटलो सु थयो. बद्धानी सामळो. मारे पास खाकरो छेना! ” आणि खरोखरच तिने तिच्या हॅन्डबॅगमधून खाकरे काढले आणि सर्वांना वाटले. इटलीत इटालियन पिझ्झा रेस्टॉरंट मध्ये आम्ही सर्वांनी ते भारतीय गुजराती कुरकुरीत खाकरे मस्त एन्जॉय केले.

प्रवासात असे अनेक अनुभव येतात. मजेचे, अडचणीचे, त्रासाचे अनेक प्रकारचे.

ओहायो स्टेटमध्ये कोलंबस या गावात राहत असताना तिथून दोनतीन तासावर असलेल्या एरी लेकवरच्या बेटावर जायचा ज्योतिका- साकेतने बेत केला. त्या दिवसाचं हवामान, वादळ वाऱ्यांविषयीचे सावध इशारे वगैरे दोघांनी काटेकोरपणे चेक केल्यानंतरच आम्ही चौघं ‘पुटीन बे’ला जायला निघालो. तिथे एक दिवस आम्ही मुक्कामही करणार होतो. तसं बुकिंगही साकेतने केलेलं होतं. समुद्रच वाटावा इतका विस्तीर्ण आणि अथांग असा तो तलाव होता. दूरवर अनेक उंच इमारती होत्या. तलावात प्रवासी, व्यापारी जहाजंही होती. प्रत्यक्ष बेटावर जाण्यासाठी आम्हाला एक क्रूज करावी लागली. गाडी किनार्‍यावरच्या कारपार्कमध्ये ठेवली आणि रात्री बेटावरच मुक्काम करणार असल्यामुळे लागणारे सामान तेवढं बरोबर घेतलं.

बेटावर पोहोचलो. चारी बाजूला असलेलं निळंशार पाणी बघून तर आमचा जीव अपार सुखावला. बेटावर फिरण्यासाठी आम्ही एक गोल्फ कार्टही घेतली. त्या उघड्या कार्ट मधून बेटावर फिरण्याची मजा वर्णनातीत होती. आम्ही मस्त गप्पा करत, गाणी गात, आजूबाजूची झाडं, घरं पाहत होतो आणि काय आश्चर्य! निसर्ग किती लहरी असतो! मानवी अंदाजावर छुपेपणाने तो कधी हल्ला करेल हे कोणी सांगायचं? एकाएकी जोरदार वादळ वारे सुरू झाले. आकाश काळोखलं आणि अक्षरश: चेंडू एवढ्या गारा आम्हाला झोडपू लागल्या. आमच्या अंगावर ‘हुडी’ होत्या तरीही गारांचा मारा आणि पावसामुळे निर्माण झालेली थंडी असह्यच होती. त्यातच आमची कार्टही बंद पडली. साकेतची अत्यंत लाडकी स्पोर्ट कॅप वाऱ्याबरोबर उडून गेली म्हणून तो अधिकच वैतागला होता. त्यातून आम्हा ज्येष्ठांची जबाबदारी! प्रसंग बाका होता. पुटीन बेवर सगळ्याच प्रवाशांची प्रचंड धावपळ चाललेली होती पण आम्हा चौघांचे हाल दारुण होते. आम्ही या वादळी पावसात भिजत रस्त्यावर होतो. तिथे जवळच एक टुमदार बंगला होता पण बंगल्याची दारं खिडक्या बंद होत्या. मनुष्यवावर तिथे जाणवतच नव्हता. क्षणभर माझ्या मनात आलं या क्षणी आपण भारतात असतो तर अशाच बंगल्याचे दार नक्की आपल्यासाठी उघडलं गेलं असतं. भिजणाऱ्या आम्हाला आत घेतलं असतं. पुसायला त्यांनी पंचे दिले असते. गरम चहाही मिळाला असता. उगीच नाही भारताला “अतिथ्यशील देश” म्हणतात. मी कोणत्या विचारात गुंग झाले हे ज्योतिकाने ओळखले असावे. ती लगेच म्हणाली, ” मम्मी त्या घराकडे अशी एकटक नजर लावून बघू नकोस. अमेरिकेत कुठल्याही कारणाने कुणालाही अरेस्ट करतात बरं का? ”

मी “भारतीय” असल्याचा अभिमान मात्र मला त्या क्षणी नक्कीच जाणवला.

पण तेवढ्यात एक अमेरिकन यंग कपल आमच्या जवळ येऊन थांबलं आणि ते त्यांच्या कार्ट मधून उतरले आणि त्यांनी त्यांची कार्ट आम्हाला देऊ केली आणि “आम्ही तुमची बंद पडलेली कार्ट रेंटल शॉप मध्ये घेऊन येऊ, डोन्ट वरी फोक्स, बी रिलॅक्स्ड” असं म्हणत आम्हाला अगदी गोड हसत त्यांनी ‘बाय’ केलं. आमच्या ‘थँक्स’ ला अगदी शालीनतेने “यु आर वेलकम मेन. ” असंही म्हटलं.

बेधुंद पावसात, गारांच्या तडाख्यात भिजण्यातला त्यांचा रोमान्स बघून कुठेतरी मनाला खरोखरच गुदगुल्या झाल्या.

एक क्षण तक्रारीचा तर दुसरा क्षण असा आपुलकीचा. त्या दुसऱ्या क्षणांनी अमेरिकन, भारतीय वगैरे लेबलं तोडून टाकली. उगीच दुभाजक असलेल्या भींती मनातल्या मनातच कोसळल्या. शेवटी निसर्गाच्या या महान पटांगणात माणूस हा फक्त माणूसच असतो. कुठल्याही राष्ट्रीयत्त्वाचा, धर्माचा शिक्का नसलेला. हा थरारक, नाट्यमय आणि नंतरचा मनुष्यपणाचा अविस्मरणीय अनुभव प्रवासात नेहमीच घेतला.

– क्रमशः भाग ७४..

© सौ. राधिका भांडारकर

पुणे

मो.९४२१५२३६६९

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ मरण : एक चिंतन… ☆ श्री संदीप सुंकले (दास चैतन्य) ☆

श्री संदीप सुंकले (दास चैतन्य) 

? मनमंजुषेतून ?

☆ मरण : एक चिंतन… ☆ श्री संदीप सुंकले (दास चैतन्य) 

मरण हा शब्द उच्चारला तरी मनुष्याला भीती वाटते. मरणाची भीती का वाटतं असावी? याचा विचार करताना असे जाणवले की मरणानंतर आपण कुठे जाणार हे माहित नाही, तसेच आज जे मी मिळवलं (? ) आहे, (त्यात स्थावर, जंगम मालमत्ता आणि आप्तस्वकीय सर्वच आले…) ते मला सोडून जावं लागेल…

विरह मनुष्याला सहन होत नाही… , त्याला सतत वाटतं असते की जे मी मिळवलं आहे ते कायम टिकेल…

*उगवलेला सूर्य देखील संध्याकाळ झालीं की अस्ताला जातो, तिथे या मर्त्य मानवाची काय कथा…? *

– – मनुष्याला मरणानंतर आपले काय होणार याची भिती असते असे मानले तर जन्म होण्या आधी हा कुठे होता? म्हणजे ते सुद्धा त्याला माहित नव्हतेच…

थोडक्यात हा प्रवास आहे…

*अज्ञाताकडून अज्ञाताकडे जाणारा… *

मग, आज आपल्याला ज्ञात काय आहे? तर मी जिवंत आहे…

– – सर्व संतांनी सांगितले आहे की *”उपजे ते नासे”*, मग अशावेळी मनुष्य म्हणून माझं आद्य कर्तव्य काय असेल?

तर *त्यावर सर्व संत एकच गोष्ट सांगतात की स्व ची ओळख करून घे… *

८४ लक्ष योनींमध्ये फक्त मानवाला हा अधिकार आहे…

इथे तुला मानवाचा देह भाड्याने मिळाला आहे…!! त्याचं अखंड स्मरण ठेवणे हे भाडं ठरलं आहे…! आईच्या गर्भातून बाहेर पडतानां मनुष्य भगवंताला वचन देतो की मी तुझे सतत स्मरण ठेवीन, पण नंतर इथल्या मोहमायेला भुलून तो देवाला पूर्णपणे विसरतो…

मरण म्हणजे देवाची भेट आहे… , तेव्हा तो मनुष्याला विचारतो की शंभर वर्ष तू या देहात राहिलास, पण भाडं काही दिले नाहीस…?

– – मग या जन्माचे भाडं चुकविण्यासाठी देव त्याला पुन्हा अन्य योनीत जन्म देतो, मग हे चक्र अव्याहत सुरू राहते…

*”पुनरपि जननं पुनरपि मरणं* 

*पुनरपि जननी जठरे शयनं”*

समर्थ रामदास आपल्याला सांगतात – – 

*मरणाचे स्मरण असावे।* 

*हरिभक्तीस सादर व्हावे।* 

*मरोन कीर्तीस उरवावे।* 

*येणे प्रकारे।।*

(दा. १२- १०-१३)

श्री गोंदवलेकर महाराज सांगतात की मनुष्याचा पुढील क्षणाचा भरवसा नाही…

*एखादा मनुष्य झोपला आणि सकाळी उठलाच नाही तर तो मेलेला आहे असे म्हणावे लागते… *

– – म्हणून मृत्यू कधी येईल हे कोणाला माहीत नाही… , म्हणून प्रत्येकाने अगदी आतापासून नामस्मरण करायला अर्थात आपले भाडं चुकतं करायला सुरुवात करू…

*कर्जाचा EMI भरला की कर्ज घेणाऱ्याला आनंद होतो, चला एक हफ्ता कमी झाला असे त्याला वाटतं असते. तसे नाम घेतले की आपला भाड्याचा हप्ता फिटायला सुरुवात झाली असे वाटले पाहिजे… *

*हळूहळू मनुष्य अखंड नाम घेऊ लागेल, मग त्याचे कर्ज कधी फिटले, भाडं देऊन कधी संपले हे आपल्याला कळणार नाही… पुढे पुढे अशी वेळ येऊ शकेल की आपण घेतलेल्या नामाचे देवावर कर्ज होईल आणि ते फेडायला तो आपल्या दारी येईल… (जसे श्रीखंडया बनून भगवंताने नाथांच्या घरी पाणी भरले, पांडवांच्या घरी उष्टी काढली…)*

– – त्यासाठी मरणाचे भय गेले पाहिजे, त्यासाठी सर्व संतांनी सांगितलेला सोपा मार्ग म्हणजे अखंड नामस्मरण!!!  

श्रीराम जयराम जयजयराम!!

© श्री संदीप सुंकले (दासचैतन्य)

मो. 8380019676

 ≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ आपलं मूल : चतुर की रॅन्चो? ☆ श्री मयुरेश उमाकांत डंके ☆

श्री मयुरेश उमाकांत डंके

??

☆ आपलं मूल : चतुर की रॅन्चो? ☆ श्री मयुरेश उमाकांत डंके

“सर, अभ्यासाला बसायलाच नको वाटतं. त्यातलं मला काही येतच नाही. आता तर परिक्षा तोंडावर आहे. काय करु, काही समजत नाही. ” बारावी कॉमर्स मध्ये शिकणारा मुलगा असं सांगताना अक्षरशः धाय मोकलून रडत होता. पालक अतिशय सुशिक्षित, आर्थिकदृष्ट्या उच्च मध्यमवर्गीय. पण मुलाच्या करिअर आणि अभ्यासाच्या बाबतीत गणित कुठंतरी चुकत होतं.

“कॉमर्स मध्ये प्रवेश घेण्याआधी कुणाचा सल्ला घेतला होता का? ” मी विचारलं.

“खास सल्ला असा काही कुणाचा घेतला नाही. पण कॉमर्स घेऊन सीए होणं हा चांगला ऑप्शन आहे, म्हणून कॉमर्स घ्यायला लावलं. ” मुलाचे वडील म्हणाले.

“घ्यायला लावलं? म्हणजे? “

“तो सीए करायला नकोच म्हणत होता. आम्हीच करायला लावलं. ” वडील.

“मला अभ्यास जमतच नाही. पाच पाच तास क्लासेस करायचे आणि अजून वरून अभ्यास करायचा, हे मला जमणारच नाही. मी आधीपासूनच सांगत होतो. पण तरीही मला जबरदस्तीनं क्लास लावला ह्यांनी.. ” मुलगा रडत म्हणाला.

“ह्याचं सगळं आईवडिलांनी ऐकायचं, तर मग एवढी एक गोष्ट आईवडिलांची ऐकली तर बिघडलं कुठं? आणि एवढं काय मोठं मागतोय मी? फक्त सीए हो एवढंच म्हणतोय ना? ” वडील म्हणाले.

“पण सीए होणं सोपं नाहीये. ” मी म्हटलं.

“बरोबर आहे ना. पण मला सांगा, तुम्ही महागडं हॉटेलिंग करता, ब्रँडेड कपडे घालता, दोनशे रुपयांच्या खाली पेन वापरत नाही, वरून पुन्हा आठवड्याला दीड हजार रुपये पॉकेटमनी घेता. ते काय सगळं फुकट येतं का? ही सगळी छानछोकी बाप देतोय ना, ती देण्याची ऐपत कमावणंसुद्धा सोपी गोष्ट नाहीय. ” वडील म्हणाले आणि मग प्रकरण अजूनच ताणलं गेलं. वाद अगदी टिपेला गेला. त्यावेळी दोघांना शांत करून मी पाठवून दिलं आणि दोन दिवसांनी फक्त वडिलांनाच बोलावलं.

“सीए होण्याचं सोडा, आधी बारावी मध्ये पास व्हायचं बघावं लागेल. ” मी म्हटलं.

“असं कसं? आम्ही त्याला क्लासेस तर सगळे लावले आहेत. ” वडील म्हणाले.

“मान्य. पण क्लासेस लावून हा प्रश्न सुटत नाही. त्याचा बेसिक प्रॉब्लेम निराळाच आहे. “

“काहीही प्रॉब्लेम नाहीये त्याला. फक्त निवांत बसून खायचंय आयुष्यभर. बाप कमावतोय ना? मग जगा त्याच्या जीवावर आणि मजा मारा.. ” वडील वैतागून म्हणाले.

“तसं माझं मत नाही. सतत अभ्यास कर म्हणून सांगणं आणि अभ्यास कुठल्या पद्धतीनं, कुठल्या तंत्रानं कर याविषयी शिकवणं ह्या दोन गोष्टींमध्ये खूप फरक आहे. तासनतास अभ्यास केला म्हणजे सगळंच आलबेल असतं, असं नसतं. ” मी त्यांना म्हटलं.

आम्ही बरीच चर्चा केली. त्यातून त्यांना त्याचं गांभीर्य लक्षात आलं असावं. त्यांनी मुलाला आमच्या “साधना” शिबिराला पाठवायचं ठरवलं. पण एकाचवेळी संताप, मनस्ताप आणि मुलाचं पुढचं सगळं भवितव्य अधांतरी दिसत असल्यानं अत्यंत अस्वस्थ झालेलं एका बापाचं मन मी त्यांच्या चेहऱ्यावर पाहत होतो.

त्यांचंही चूक नाही म्हणा. सतरा-अठरा वयाच्या मुलाचं शिक्षण किमान बारा वर्षं तरी झालेलंच असतं. बारा वर्षं हा काही कमी काळ नाही. एवढ्या मोठ्या काळात, चांगल्या शाळेत घालून, चांगल्या ट्युशन्स लावूनसुद्धा मुलाची अभ्यास करण्याची पद्धतच अजून म्हणावी तितकी चांगली नाही म्हणजे काय? पालकांना असं वाटणं अगदी स्वाभाविक असतं. कित्येकांना तर अभ्यास कौशल्य आणि परीक्षा कौशल्य हे तर फॅड वाटतं.

पण तसं नाही. हे फॅड नाही. तुम्ही कोणत्याही क्षेत्रातली माणसं बघा, त्या क्षेत्रात चांगलं, वेगवान, अचूक काम करण्यासाठीची त्यांची स्किल्स वेगवेगळी असतात. मग ते एखाद्या भेळवाल्याचं कांदा कापण्याचं स्किल असो, माडावरून नारळ उतरवणं असो, एखाद्या महागड्या सिल्क साडीला इस्त्री करणं असो किंवा तंदूर भट्टीवर काम करणं असो.. कौशल्य तर आहेच.

आपण बऱ्याचवेळा कौशल्य या संकल्पनेचा चुकीचा अर्थ लावतो आणि तिथंच फसतो. कौशल्य म्हणजे कमीतकमी वेळात जास्तीत जास्त काम करणं, असं आपल्याला वाटतं. पण तसं नाही. कौशल्य म्हणजे एखादं काम इतरांपेक्षा अत्यंत उत्तम आणि अचूक करण्यासाठीचं स्वतःची अशी खास शैली विकसित करणं. त्यासाठी गती हवी, शक्ती हवी, बुद्धिमत्ता हवी, योग्य मार्गदर्शन हवं, शिस्त हवी, सातत्य हवं आणि निरंतर सराव हवा. गती, शक्ती, बुद्धी, मार्गदर्शन, शिस्त, सातत्य आणि सराव या सातही गोष्टींचा एकत्र समन्वय साधल्याशिवाय कुठलंच कौशल्य कोणत्याही माणसात विकसित होऊच शकत नाही. जेव्हा या सातही गोष्टी एकत्र साधल्या जातात तेव्हा त्या कृतीमध्ये एक निराळं चैतन्य येतं, ती गोष्ट इतरांपेक्षा अत्यंत उत्तम होते, इतरांपेक्षा तिची गुणवत्ता वाढते आणि अर्थातच त्या व्यक्तीचा आत्मविश्र्वासही वाढतोच. आपल्याला असं वाटत असतं की, अशी कुशल माणसं त्यांच्या गोष्टी किती सहजपणे आणि बिनकष्टात करतात, पण तसं नसतं. कष्ट तर करावेच लागतात. पण कष्टांचे डोंगर उपसणं आणि योग्य दिशेनं कष्ट करणं यामध्ये खूप फरक असतो.

आता नेमकं इथंच आपल्या मुलांचं अभ्यास प्रकरण फसतं. केवळ शाळा, कॉलेज, क्लासेसना गेलं म्हणजे अभ्यास होतोच, असं कुणाला वाटत असेल तर तो मोठा गैरसमज आहे. जोपर्यंत अत्यंत शिस्तबद्ध आणि योग्य पद्धत वापरुन सराव होत नाही, तोपर्यंत चांगला अभ्यास होऊच शकत नाही.

केवळ शिकलेलं लक्षात राहणं म्हणजे अभ्यास असं अनेकांना वाटतं. पण तोसुद्धा असाच मोठा गैरसमजच आहे. मला चित्र कसं काढायचं हे माहिती असलं म्हणजे उत्कृष्ट चित्र काढता येईलच असं नाही. एखादी रेसिपी तोंडपाठ केली म्हणजे तो पदार्थ अत्यंत उत्तम जमेलच, असं नाही. वर्षानुवर्षं आपल्या घरात तयार होत असूनही आपल्याला एखाद्याच्या हातचीच चकली आवडते, एखाद्याच्या हातचेच गुलाबजाम आवडतात. साधी भेळ खाण्यासाठीसुद्धा आपण ठराविक भेळवाल्याकडेच जातो. कपडे शिवायला टाकण्यासाठीचा आपला टेलर ठरलेला असतो. घरच्या कार्यक्रमांमध्ये फोटो काढणारा फोटोग्राफर ठरलेला असतो इथपासून ते मेंदी कुणाकडून काढून घ्यायची हेही ठरलेलं असतं.

या सगळ्या व्यक्तींमध्ये एक समान धागा असतो. तो म्हणजे त्यांच्या त्यांच्या कामातलं त्यांनी प्राप्त केलेलं गुणवान कौशल्य. “मी आठ दिवस सँडविच च्या स्टॉलवर उभा राहिलो ना, तर मी ह्याच्यापेक्षा सुद्धा भारी करुन दाखवीन” हे म्हणणं सोपं असतं. पण ते जमणं कठीण असतं. झाकीरभाई जगात भारी तबला वाजवतात यात शंकाच नाही. पण त्यांच्या वादनाला शोभेल असा तबला तयार करणं, हेही सोपं काम नसतं. चार चार रिबाँड स्ट्रोक्स अगदी लिलया बसतील असा कॅरमबोर्ड तयार करणं प्रत्येकालाच जमत नाही.

आता काळानुसार शैक्षणिक अभ्यासक्रम बदलले आहेत, बहुतांश अभ्यासक्रमांसाठी निरनिराळ्या प्रवेशपरीक्षा आल्या आहेत, त्यांचेही अभ्यासक्रम आहेत आणि वेगळ्या परीक्षापद्धती आहेत. त्यात यश मिळवणं गरजेचंच आहे. नुसत्या पाठांतरावर, वाचनावर किंवा लिखाणावर ते शक्यच नाही. मग एकाचवेळी नियमित अभ्यास आणि प्रवेशपरीक्षेचा अभ्यास हा तोल सांभाळायचा कसा? त्यासाठीच हवं अभ्यास कौशल्य आणि परीक्षा कौशल्याचं शास्त्रशुद्ध प्रशिक्षण..

मानसतज्ज्ञ मयुरेश डंके आणि पूर्वा डंके यांचं “साधना” हे कौशल्य शिबिर गेली २० वर्षं झाली, शेकडो विद्यार्थ्यांना अभ्यास आणि परीक्षा कौशल्यांचं प्रशिक्षण देतंय. विशेष म्हणजे, साधना शिबिरातलं एकही अभ्यास कौशल्य किंवा परीक्षा कौशल्य अन्यत्र कुठंही सापडतही नाही आणि शिकवलंही जात नाही. कारण, यातलं प्रत्येक कौशल्य त्यांनी स्वतः संशोधन करुन विकसित केलेलं आहे. प्रत्येक विषयच नव्हे तर, प्रत्येक धड्याच्यानुसारसुद्धा अभ्यासाची तंत्रं त्यांनी आखली आहेत. त्यांची कुठलीच अभ्यास पद्धत गूगलवर सुद्धा सापडत नाही. त्यामुळं, हे खऱ्या अर्थाने अत्यंत वेगळं आणि आपल्या मुलांसाठीचं मूलभूत आवश्यक प्रशिक्षण आहे.

दरवर्षी हे शिबिर २७ ते ३१ डिसेंबर या काळात पुण्यात सिंहगड किल्ल्याच्या पायथ्याशी होतं. हे पूर्णवेळ निवासी शिबिर असतं. सगळ्या मुलांची राहण्याची आणि भोजनाची उत्तम सोय असते. चार दिवसांच्या या प्रशिक्षणात मुलांसाठी एकूण २३ सेशन्स असतात, सरावाची सत्रे वेगळी असतात. पालकांसाठी स्वतंत्र सेशन असते. यावर्षी पालकांसाठी एकूण चार सेशन्स असणार आहेत. शिबिरासाठी विद्यार्थीसंख्या खूपच कमी असते. केवळ २५ विद्यार्थ्यांनाच प्रवेश देण्यात येतो.

दोन महिन्यांवर बोर्डाची परिक्षा आलेली असताना शून्य अभ्यास झालेला हा मुलगा जून महिन्यात मात्र आनंदानं नाचत पेढे घेऊन आला. ज्या परीक्षेत नापास होण्याची त्याला पूर्ण खात्री होती, त्याच परीक्षेत त्यानं ८३% गुण मिळवले होते. सगळा “साधना” शिबिराचा परिणाम..! आपल्या देशातली शिक्षणव्यवस्थाच अशी आहे की, मुलांना स्वतःला एकाचवेळी विद्यार्थी आणि मार्कार्थी असं दोन्हीही घडवावं लागतं. आणि “साधना” मध्ये ते काम अगदी परफेक्ट होतं..!

यशाची कथा आपोआप लिहिली जात नाही, त्यासाठी कौशल्य लागतं, हे मात्र खरं..!

©️ श्री मयुरेश उमाकांत डंके

मानसतज्ज्ञ, संचालक-प्रमुख, आस्था काऊन्सेलिंग सेंटर, पुणे.

 8905199711, 87697 33771

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ “मधुमालती…” ☆ सुश्री नीता चंद्रकांत कुलकर्णी ☆

सुश्री नीता कुलकर्णी

? मनमंजुषेतून ?

☆ “मधुमालती…” ☆ सुश्री नीता चंद्रकांत कुलकर्णी

रस्त्याने जाता जाता मधुमालतीची वेल दिसली… आणि थबकून उभीच राहिले.. पूर्ण कंपाउंड भर तो वेल पसरला होता. लांब नाजूकशी दांडी… मंद लाल… गुलाबी रंग… मध्येच पांढऱ्या रंगाची थोडी पखरण… पाच पाकळ्यांचे हे नाजूक फुल…

खाली वाकलेलं…

अशा मधुमालतीचे अक्षरशः घोसच्या घोस वेलीला लागलेले होते.

पानं मधून डोकावत होती. त्यांच्या हिरव्या रंगाजवळ ही फुलं अजूनच गोड दिसत होती.

निसर्गाने त्याच्या सौंदर्याची मुक्त उधळण केली होती.

हलकेच फुलांवरून अलगद हात फिरवला. तिथून निघावं…

असं वाटतच नव्हतं.

कितीतरी वेळ मी फुलांजवळ उभी होते.

 

निसर्गात किती विविध फुले आहेत.. थोडं शांतपणे थांबून त्यांच्याकडे बघत उभ राहावं… त्यांचं वैभव न्याहाळत त्याचा आस्वाद घ्यावा…

त्याच्याशी समरस व्हावं…

 

हे असं सौंदर्य आपल्याला तो दाखवत आहे… त्याच्याबद्दल त्या क्षणी आपल्या मनात कृतज्ञता दाटून येते. तेवढा काळ तरी आपल्याला इतर गोष्टींचा विसर पडतो.

 

डोळे दृष्टीसुख घेत असतात..

त्याचे मनोहारी तरंग अंगभर लहरत राहतात… तो प्रेमभाव घेऊन घरी यावं..

तो दिवस बघा… कसा समाधानात जातो…

आपणच आपल्यावर खुश होतो.. उत्साहीत होतो.. असं सहज जाता जाता पहात राहावं..

आनंद घेत राहावा.. मुख्य म्हणजे यासाठी आपल्याला काही करावं लागत नाही…

 

बाहेर पडायचं डोळस दृष्टीने बघत राहायचं… मग अनुपम्य असं काहीतरी दिसतच.. त्याची नंतर होणारी आठवणही सुखद असते.

काय बघायचं याची” नजर “आता आलेली आहे…

” येईन रे तुला परत बघायला “

असं म्हणून त्याचा निरोप घेऊन चालायला लागले..

 

तिथून जरा पुढे गेले तर…

एका झाडावर तजेलदार पिवळ्या रंगांच्या फुलांचे गुच्छ लागलेले…

नाजूक अलवार कोमल फुलं…

कितीदा त्यांच्याकडे पाहू…

असं वाटत होतं.. मन भरतच नव्हतं..

दिमाखात झाडावरती.. वाऱ्यावर डोलत होती. अगणित फुलचं फुलं दिसत होती… खाली पिवळ्या फुलांचा सडा पडला होता…

 

इतक्या उंच असल्याने मान वर करून त्यांच्याकडे कोणी बघतही नव्हतं… ती बिचारी ऊमलतात फुलतात… त्यांची दखल घेतलीच जातं नाही…

मला त्याचं वाईट वाटलं…

माझ्या मनात विचार आला…

त्या फुलांना काय बरं वाटत असेल…

 

इतक्यात दोन छोट्या मुली तिथे आल्या. जवळ रहात असाव्या.

त्यांनी खाली पडलेली फुलं गोळा करायला सुरुवात केली. नंतर एकत्र करून आपल्या हातात पकडली. मला त्यांच कौतुक वाटल.

मी त्यांना विचारलं,

” या फुलांचं तुम्ही काय करणार ग? “

 

” आमच्या सोसायटीच्या दारातच छोटासा गणपती बाप्पा आहे. त्याच्यासाठी आम्ही ही रोज घेऊन जातो. “

निरागसपणे ती म्हणाली…

 

मगाशी मला ज्या फुलांची दया आली होती…

ती फुलं प्रत्यक्ष परमेश्वराच्या चरणी अर्पण होणार होती.

किती थोर त्यांचं भाग्य होतं…

 

लहान लेकरं निष्पापपणे असं वागतात… बोलतात…

त्यांच ऐकून मग मी थोडी शहाणी होते.

 

वर झाडाकडे मायेनं बघितलं…

खाली पडलेली फुलं मी पण उचलून घेतली…

घरी आणली..

माझ्या बाप्पासाठी…

© सुश्री नीता चंद्रकांत कुलकर्णी

मो 9763631255

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ तांबड्या माठाची भाजी… भाग – २ ☆ सुश्री नीला महाबळ गोडबोले ☆

सुश्री नीला महाबळ गोडबोले

??

☆ तांबड्या माठाची भाजी… भाग – २ ☆ सुश्री नीला महाबळ गोडबोले

(पीठ पेरून असो, डाळ घालून असो नाहीतर गोळा भाजी असो.. पोळीबरोबर किंवा भाकरीबरोबर… मेथी स्वत:च्या गंधाची पदोपदी जाणीव देत असते.. अगदी दुसरे दिवशीपर्यंत…) –

इथून पुढे —-

ताकातला पालक, ताकातलं चाकवत किंवा अळूचं फदफदं… गरम गरम आंबेमोहर किंवा इंद्रायणीचा मऊसर भात, त्यावर भरपूर लोणकढं तूप… तो भात पाचही बोटांनी शिते मोडेपर्यंत कालवावा आणि एकेक घास करून त्यावर ही पातळ भाजी ओतून तो घास पुन्हा कालवावा नि पाच बोटांनी तोंडात घालावा. जिव्हा आणि आत्मा असा काही तृप्त होतो की जगणं जगणं रहात नाही.. त्याचं गाणं होऊन जातं!

बटाट्याची बातच और… वरून नशीब घेऊन आलेला… त्याचं काहीही केलं तरी सोनच व्हावं असा!

उगाच नाही राहुल गांधी बटाट्याचं सोनं बनवणारं मशीन करणार होता!

तर अशा या भाज्या… किती नावं घ्यावीत त्यांची नि किती वर्णन करावं त्यांचं?

रोजच्या जेवणात वैविध्य निर्माण करणा-या या भाज्या ” कोणती भाजी करावी? ” या रोजच्या प्रश्नचिन्हानं गृहिणींना सतावणा-या नि “अमुक भाजी करावी तर सुधानेच बरं का… ” असं प्रशस्तीपत्रक बहाल करणा-या… म्हणूनच भाजी हा गृहिणींच्या जिव्हाळ्याचा विषय..

आज विविध अॅपद्वारे घरापर्यंत भाजी येते नि फ्रीजमधे ती आठवडाभर साठवलीही जाते.

पण माझ्या बालपणी ना ऐप होते ना फ्रीज… गृहिणींना रोजची भाजी रोज आणावी लागे… टी. व्ही. , इंटरनेट, मोबाईल नसण्याच्या त्या काळात रोज संध्याकाळी बाजारात जाऊन भाजी आणणे, हा एक विरंगुळा होता… रोजची वेगळी भाजी हा जसा खाद्यजीवनातील विरंगुळा तसा भाजी आणायला जाणे हा रोजच्या जीवनातला!!

माझी आईही याला अपवाद नव्हती… चेहरा धुवून, छान साडी नेसून आई पावडर, कुंकु लावायची. कानातलं घालायची… आधीच गोरीपान, निळ्या डोळ्यांची अशी छान दिसणारी माझी आई अजूनच सुरेख दिसायची. आठ-नऊ वर्षांची मी तिचं बोट पकडून तिच्या बरोबर भाजीला जायचे. वाटेत ओळखीच्या बायका भेटायच्या. त्यांच्याबरोबरच्या गप्पा व्हायच्या. मग भाजी खरेदी व्हायची.

भेंडी, दुधी, मुळा, काकडी यांना नख लावून त्यांचं कोवळेपण पारखणे, गोल, पातळ पानांची मेथी कडू नसते, वांगी किडलेली नाही नं ते पाहून कशी घ्यायची.. अशा अनेक गोष्टी मी कोणीही न शिकवता केवळ पाहून शिकले… विविधरंगी ताज्या भाज्यांतून घडणारा निसर्गाचा अविष्कार मला तेंव्हापासून आजतागायत आनंद देतोय..

“कमी पैशांत जास्तीत जास्त खरेदीचा आनंद भाज्या देतात. “. हे सत्य मला खूप लहानपणी समजलं. म्हणूनच कदाचित आजही मला इतर कोणत्याही खरेदीत रस वाटत नाही पण भाजी खरेदी मात्र मनापासून आवडते.

कधी कलिंगडासाठी तर उसाच्या रसासाठी केलेला हट्ट आणि तो पूर्ण झाल्यावर मिळालेला जग जिंकण्याचा आनंद…!! परतीला आईच्या मैत्रिणीच्या घरी जाणं, तिथे प्यालेली कॉफी किंवा सरबत… किंवा त्यांच्या पायरीवर बसून मारलेल्या गप्पा… कधी कधी बाजारात जाताना घरच्या विवंचनेनी वैतागलेल्या आईची कळी परतताना मात्र खुललेली असे!!

गवारी, घेवडा किंवा पालेभाजी निवडणे हा घरातला एक सांस्कृतिक कार्यक्रम असायचा. आई गच्चीत किंवा घराच्या पायरीवर बसून भाजी निवडे. मी, माझी थोरली बहीण घरी असलो तर तिला मदत करायचो. भाजी निवडताना आई तिच्या लहानपणीच्या सुखदु:खाच्या गोष्टी सांगायची.. तिच्या बरोबर तिच्या आठवणींच्या सहलीत आम्हीही सामील व्हायचो… मोठ्या होताना आम्ही भाजी निवडतानाच तिची सुखं दु:खं वाटून घेतली.. नि तिनेही आमची!! .. सुखात आम्ही तिघीही हसलो नि डोळ्यातल्या पाण्याबरोबर दु:खही साजरं केलं!! … कदाचित त्या भाजीने आमच्यातील बंध अजूनच घट्ट केले..

” आज भरलेली वांगी करा “, ” उद्या चाकवताची भाजी करणार नां? ” बाबा हक्काने सांगायचे नि आई आवडीने त्या भाज्या करायची..

कधीतरी आईबाबांचं काहीतरी बिनसलेलं असायचं.. काही दिवस सारं घर शांत असायचं.. दोघांत अबोला.. त्या तणावाने आम्ही मुलेही गप्प गप्प असायचो..

एक दिवस पानात बाबांची आवडती भरल्या वांग्याची भाजी आणि तोंडलीभात दिसायचा … बाबांचं आईकडे पाहून खुदकन् हसणं आमच्या चिमुकल्या नजरांनाही जाणवायचं… आईचा चेहराही प्रसन्न व्हायचा नि अमावस्येचं सावट सरून सारं घर चांदण्याच्या शुभ्र प्रकाशात हसतं खेळतं व्हायचं!!

एकदा आमच्या कारखान्यातल्या पाठीमागच्या भल्यामोठ्या मोकळ्या जागेत भाजी लावायचं आईबाबांच्या डोक्यात आलं. रोज सकाळी बागकाम सुरू झालं.. गवा-या, दुधीभोपळे जोमाने आले.. घरी, दारी, काकांकडे रोज गवा-या नि दुधी जाऊ लागले..

सुरुवातीला सगळा आनंदीआनंद होता.. नंतर मात्र गवारी नि दुधीच्या रोजच्या वासाने जेवणावरची वासना उडू लागली..

 ” चार कानाखाली द्या पण गवारी, दुधी नको ” असे शेजारीपाजारीही म्हणू लागले नि आई बाबांच्या बागकामाच्या आवडीने निरोप घेतला..

भाजी पुराण तर झालं … पण माझी आवडीची भाजी मी तुम्हाला सांगायचं राहूनच गेलं…

मला ” लाल माठाची ” भाजी भयंकर आवडायची.. मी वाटीभर भाजी नुसतीसुद्धा खायचे.. पोळी, भाकरीबरोबर अगदी गरमगरम तूप भातासोबतही मी लाल माठाची भाजी मिटक्या मारत खात असे..

एखादी रविवारची सकाळ असायची.. बाबा कारखान्यात गेलेले असायचे. भाऊ बहीण जादा तासाला किंवा त्यांच्या मित्रमैत्रिणीकडे… मी खोलीत अभ्यास करत बसलेली.. आदले दिवशी गणिताच्या पेपरात बरेच कमी मार्क पडलेले.. आईने अभ्यास घेऊनही… आईने पाठीत घातलेले दोन धपाटे नि धरलेला अबोलाही… जगणंच फोल वाटायला लावणारा… दिवसभर नि रात्रीही डोळ्यातून न थांबणारं पाणी… आई नि माझ्यात पडलेलं हजारो मैलाचं भावनिक अंतर… नि आईचा आलेला हजारो टन राग…

आदले दिवशी रात्रीच्या जेवणावर टाकलेला बहिष्कार… त्यामुळे सकाळी पोटात उसळलेला भुकेचा डोंब..!! .. स्वयंपाकघरातून जाणवणारी आईची चाहूल… हळूच सवयंपाकघरात डोकावणं… आई विळीवर एक पाय वर घेऊन बसलेली… शेजारी स्टीलच्या चाळणीत धुतलेली लालबुंद माठाच्या भाजीची पाने… आईचं ती पाने मुठीत घेऊन विळीवर चिरणं.. चिरण्याचा येणारा चरचर आवाज… आईचे भाजीमुळे लालबुंद झालेले हात… गॅसवर ठेवलेला काळाभोर लोखंडी तवा… त्यात घातलेलं तेल नि पाठोपाठ घातलेला भरपूर लसूण… नि त्यावर घातलेली चिरलेली माठाची भाजी… चर्रर्र… आवाज नि पाठोपाठ उसळलेला स्वर्गीय सुगंध… एका बाजुला पोटातली जबरदस्त भूक नि दुसरीकडे आईवरचा राग..

“हिने मुद्दाम आज माझ्या आवडीची भाजी केलीय पण मी जेवणार नाही “… मनाशी केलेला निश्चय… आईचं खोलीत येणं नि हाताला धरून स्वयंपाकघरात ओढत नेणं! दुस-या तव्यावर टाकलेली भाकरी… आता ताटलीत टम्म फुगलेली गरमागरम भाकरी, त्यावर तूप नि कडेला मला भयानक आवडणारी लाल माठाची भाजी…

आई ताटली घेऊन माझ्याजवळ बसलेली… भाजी लावून भाकरीचा एक घास माझ्या तोंडाजवळ आईने नेलेला… मला भरवण्यासाठी..

” मला नको… मी नाही खाणार “

” असं रागावतात आईवर? आई चांगल्यासाठीच रागावते नं? आता पुढच्यावेळी जास्त अभ्यास करून छान मार्क मिळवायचे.. शहाणं माझं बाळ! आणि माझे हात पाहिले का कसे लाल झालेत.. आणि भाकरी पाहिली का.. माझ्या बांगडीची कशी नक्षी उमटलीय भाकरीवर!! “

आईचे भाजीमुळे रंगलेले हात नि भाकरीवरची तिच्या सोन्याच्या बांगडीची नक्षी पाहिली नि मला हसू आवरेना नि त्याचवेळी डोळे पाझरू लागले… आईला घट्ट मिठी मारली… आईची मऊ साडी ओलीकच्च झाली नि त्याचवेळी माझे केसही…!!

माठाने रंगलेल्या आईचे हात नि भाकरीवर उमटणारी तिच्या सोन्याच्या बांगड्यांची नक्षी आम्हा भावंडांना प्रत्येक वेळी हसवायची… यावेळी मात्र त्यांनी आम्हा दोघी़ंना रडवलं!!

दिवस कसे पळत होते ते कळलच नाही…

एके दिवशी डोक्यावर अक्षता पडल्या नि सासरचा मार्ग धरला… माहेर मागे पडलं.. नव्या आयुष्यात जुन्या गोष्टी दिसेनाशा झाल्या… सासरी रोज स्वयंपाक करायचे पण सोलापुरात ” तांबडा माठ ” मिळत नाही ही गोष्ट लक्षातही आली नाही… प्राधान्यक्रम बदलले होते..

मिरजेला माहेरी गेल्यावर आई विचारायची, ” उद्या लाल माठाची भाजी करू कां गं? “

पण त्या तारुण्याच्या बहरात आईनं केलेल्या लाल माठाच्या भाजीपेक्षा हॉटेलातील लाल रंग घातलेल्या बटर पनीर मसाल्याकडे जीव ओढला जायचा… अशावेळी त्या माऊलीचं अंत:करण नक्कीच दुखावत असणार.. पण तिने ते चेह-यावर कधीच दाखवलं नाही!

काळ पुढे जातच होता… त्याने आईच्या स्वय़ंपाक करणा-या हातांचा वेग कमी केला… आता आई फक्त भाजी निवडण्याचं काम करू शकायची…

… आणि एके दिवशी काळाने तिला पुर्णपणेच थांबवलं… नि तिला अनंताच्या प्रवासाला तो घेऊन गेला…!!

मानवी मन मात्रं अनाकलनीय असतं..

त्याचे हिशोब, त्याचं वर्तन सारं गूढ प्रदेशातलं…!!

आई गेल्यानंतर तिच्या आठवणींनी पिंगा घालायला सुरूवात केली.. ती असताना जी लाल माठाची भाजी मनाच्या पडद्याआड गेली होती… तिची रोज आठवण येऊ लागली…

… म्हणूनच वहिनीकडे फक्त लाल माठाची मागणी केली… वहिनीने आणलेला लाल माठ पाहून जीव सुखाच्या गावातून फिरून आला…

भाऊ वहिनी दुसरे दिवशी सकाळीच परत गेले… त्याच दिवशी लाल माठाची भाजी नि भाकरीचा बेत आखला… स्वयंपाकाच्या मावशींनी मी सांगितल्याप्रमाणे भाजी नि भाकरी केल्या… भाजी चांगलीच लागत होती… भाकरी तर आईच्या भाकरींपेक्षा पातळ होत्या..

 

– – पण… भाजी-भाकरी घशात अडकत होती… कारण लेकराला आनंदाने जेवताना पहाणारी माझ्या माऊलीची ती स्निग्ध नजर आज नव्हती… लाल माठाच्या भाजीमुळे लाल लाल झालेले आईचे गोरेपान हात नव्हते… नि ते पाहून वेड्यासारखं हसत सुटणारी माझी बहीण माझ्यासोबत नव्हती..

… आणि मुख्य म्हणजे पांढ-याशुभ्र भाकरीवर आईच्या सोन्याच्या बांगड्यांची नक्षी उमटलेली नव्हती!

– समाप्त –

© सुश्री नीला महाबळ गोडबोले 

सोलापूर 

फोन नं. 9820206306,  ई-मेल- gauri_gadekar@hotmail. com; gaurigadekar589@gmail. com

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ गिल्टी माइंडस्… ☆ सुश्री तृप्ती कुलकर्णी ☆

सुश्री तृप्ती कुलकर्णी

🪷 मनमंजुषेतून 🪷

☆ गिल्टी माइंडस्…  ☆ सुश्री तृप्ती कुलकर्णी

गिल्टी माईंड्स – – 

 – – बोध आणि शोध अपराधी मनोवृत्तीचा!

या वेब सिरीजच्या नावाने लक्ष वेधून घेतलं होतं पण एकूण त्या नावाचा जो आशय आहे त्यावरून यामध्ये प्रचंड खून खराबा, किंवा अश्लीलता असेल की काय असं वाटत असल्याने बऱ्याच आधीपासून नोटिफिकेशन्स आले तरी पाहिली जात नव्हती. शेवटी एकदा एखादा एपिसोड बघूया आणि मग ठरवूया असं म्हणून या शीर्षकाने खेचून घेतलं आणि वेब सिरीज बघायला सुरुवात झाली.

आजकाल कोणतीही वेबसिरीज बघायची झाली तर तुम्हाला अश्लीलता, खून हिंसा आणि अल्कोहोलिकता याचा सामना करावाच लागतो. अगदी काही कौटुंबिक वेब सिरीज सोडल्या तर जवळपास प्रत्येक वेब सिरीजचा हा एक अपरिहार्य भाग असल्याप्रमाणे झालं आहे. हे असं का आहे हा प्रश्न पडणारी व्यक्ती म्हणजे जणू आजच्या काळातली मागासलेली ठरावी अशी परिस्थिती आहे, त्यामुळे त्याच्यावर बोलण्यात फार काही हशील आहे असं वाटत नाही. तर असो.

मूळ मुद्दा हा आहे की ही वेबसिरीज त्याला अपवाद आहे. म्हणजे यात हिंसा, क्रौर्य किंवा अल्कोहोलिकता, वगैरे नाही असं नाही. परंतु त्याचं प्रमाण अतिशय मर्यादित आहे. ही एका कोर्टाच्या कामकाजावरती केंद्रित अशी वेबसिरीज आहे. त्यामुळे अर्थातच यामध्ये काम करणाऱ्या सर्व पात्रांचा वकीली हा व्यवसाय दिसतो. आणि वकिली म्हटलं की गुन्हा आला, आरोप आले, प्रत्यारोप आले, डावपेच आले, शिक्षा आली, कायदा आला. हे सगळं याच्यामध्ये आलेलं आहे पण बरंच वास्तवदर्शी आहे. कथानकात, मांडणीत कुठेही भाबडेपणा नाही. अतिरंजितता नाही आणि हे थोडेसं कौतुकास्पदही वाटलं. खरं म्हणजे यातले कित्येक प्रसंग असे आहेत की जे खूप लाऊडसुद्धा करता आले असते परंतु वास्तवदर्शी चित्रण करण्याचा हेतू असल्यामुळे असेल ते जेवढ्यास तेवढ्या प्रमाणामध्ये दाखवले गेले आहेत. आणि म्हणून ते जास्त परिणामकारक ठरले आहेत. इथे व्यक्ती आणि समाज म्हणून घडणाऱ्या गुन्ह्यांमागची मानसिकता आपल्याला जास्त विचार प्रवृत्त करते.

दुर्दैवाने आज गुन्हेगारी हा विषय आपल्याला नवीन नाही. समाजात दिवसातल्या 24 तासात कुठल्या ना कुठल्या प्रकारचे गुन्हे घडत असतात. त्यातल्या काही मोजक्याच गुन्ह्यांची नोंद केली जाते. त्यातल्याही काही मोजक्या गुन्ह्यांवर खटले चालवले जातात. आणि त्यातल्याच काही मोजक्याच खटल्यांचा योग्य प्रकारे निकाल लागतो. याची आपल्यासारख्या सर्वसामान्य माणसांना पुरेपूर कल्पना आहे. ती कल्पना किती बरोबर आहे हे या वेब सिरीजमधून चांगल्या प्रकारे अधोरेखित होतं.

मला महत्त्वाचा मुद्दा मांडायचा होता तो म्हणजे हा की वकिली व्यवसायाकडे एका वेगळ्या मानसशास्त्रीय दृष्टिकोनातून बघितलं जाण्याचं हे एक दुर्मिळ उदाहरण आहे असं म्हणता येईल. आणि या वेबसिरीजचं शीर्षकच ही मानसिकता चपखलपणे मांडतं.

एकामागे एक येत जाणाऱ्या केसेस, ते सोडवत जाणारे वकील, त्यांचे प्रत्यक्षातले एकमेकांशी असलेले संबंध, एकीकडे कायद्याची बुज राखण्याची त्यांची मनापासून चाललेली धडपड, दुसरीकडे काही सामाजिक आणि राजकीय दबाव यांच्यातून घ्यावे लागणारे निर्णय अशा सगळ्या पार्श्वभूमीवरती खरा न्याय हा कसा कोंडीत पकडला जातो ते यातून प्रभावीपणे दिसतं.

गुन्हा करणारा माणूस आहे, त्याला वाचवणारा आणि त्याला शिक्षा ठरवणारासुद्धा माणूस आहे ही सगळी माणसं आहेत समाजात वावरणारी, सामाजिक नीतिनियम यांची पुरेशी कल्पना असणारी, काही प्रमाणामध्ये साक्षर, काहींना तर कायद्याच्या वाटा आणि पळवाटाही माहित आहेत अशी, तरीही त्यांच्याकडून स्वार्थी भावनेतून गुन्हे घडतात. आणि त्यातून वाचण्याचा, वाचवण्याचा प्रयत्न सुरू होतो. पण हा प्रयत्न सुरू असताना एका वकिलाच्या मनात निर्माण होणारे प्रश्न, वैचारिक आंदोलन, त्यांना कराव्या लागणाऱ्या तडजोडी यासुद्धा खूप छानपणे यातून मांडलेल्या आहेत. इथे वकिलातला माणूस आणि माणसातला वकील दोन्हीही प्रभावीपणे दिसतात.

या वेब सिरीजमध्ये प्रत्येक भागामध्ये वेगळ्या प्रकारचा गुन्हा आहे आणि विशेष म्हणजे वेगळ्या पातळीवरचे जणू काही भविष्यकाळात घडू शकतील अशा प्रकारच्या गुन्ह्यांची नोंद या वेब सिरीजमध्ये घेण्यात आलेली आहे. इथे गाण्याच्या कॉपीराईटचा प्रश्न आलेला आहे. इथे आयव्हीएफ तंत्रज्ञान मध्ये केले जाणारे घोटाळे आलेले आहेत. व्हिडिओ गेमच्या माध्यमातून हिंसा करायला प्रवृत्त होणारी तरुणाई इथे आली आहे. स्वयंचलित मोटार मुळे निर्माण होणारा अपघात आणि त्यातून निर्माण होणारी गुंतागुंत इथे आहे. म्हणजे चालू आणि पुढील आधुनिक काळामध्ये घडू शकतील अशा प्रकारच्या गुन्ह्यांचा विचार यात प्रामुख्याने केलेला दिसतो. आणि हेच मला या वेब सिरीजचे सगळ्यात मोठे आणि महत्त्वाचे असं यश वाटले. शिवाय प्रत्येक केसमध्ये भाबडेपणाने काव्यगत न्याय न देता कायदा हा पुरेशा पुराव्यांवरच चालतो हे मांडलं आहे. मग तो गुन्हा कितीही गंभीर स्वरूपाचा का असेना. आणि अनेकदा जिंकू पाहिलेली केस एखाद्या पुराव्याने हरवू शकते तर एखादी हरू पाहणारे केस ही योग्य त्या प्रकारे जिंकताही येते हे अतिशय स्पष्टपणे दाखवलेले आहे.

यातली सर्व पात्रे अतिशय उत्तम रीतीने आपापल्या भूमिकेनुसार चोख वागतात. कारण अशा भूमिकांमध्ये संयम बाळगणे हे खरंच कठीण आहे. भूमिकेचा तोल चुकूनसुद्धा एखाद्या विशिष्ट विचाराकडे झुकू शकतो आणि त्यातून त्या पात्राकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलू शकतो. या सर्व भूमिका ग्रे शेड्समध्ये आहेत कारण वकील असो की न्यायाधीश त्याला अनेकदा अनेक गोष्टींकडे केवळ पुराव्या अभावी कानाडोळा करावा लागतो आणि निर्णय घ्यावे लागतात. इथे भावनांपेक्षाही कर्तव्याला आणि समोर उपलब्ध असलेल्या पुराव्याला महत्त्व आहे हे दाखवताना कमालीचा संयम मला यात आढळला.

यातले मुख्य कलाकार, उप कलाकार कोण या सगळ्या गोष्टी गुगलवर सर्च केल्यावर नक्कीच मिळतील त्यामुळे त्या मी इथे देत नाही. मात्र सर्व कलाकारांचं काम हे वाखाणण्याजोग झालं आहे.

प्रत्येकाने तुम्हाला हिंसा आवडत असो अगर नसो गुन्हेगारीबद्दल वाचणं पाहणं आवडत असो नसो ही वेब सिरीज एकदा पहावी असं माझं सांगणं आहे. त्यावरून साधारणपणे गुन्हा काय असतो, गुन्हेगाराची मानसिकता काय असते, खटले कसे दाखल होतात, वकील कशा प्रकारे विचार करतात, आणि एकूणच ज्या सामाजिक जगतात आपण जगतो, ज्या कायद्याच्या आधारे आपण जगू पाहतो आहोत, सुरक्षितता बाळगू पाहतो आहोत तो कायदा नक्की कसा वागतो. त्याचा कसा वापर होतो. याचे उत्तम उदाहरण देणारी ही वेब सिरीज आहे. त्यामुळे जरूर जरूर पहा.

– – या वेब सिरीजला जर रेटिंग द्यायचं झालं तर माझे पाच स्टार्स नक्की असतील.

© तृप्ती कुलकर्णी

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares