मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ “स्लो लिव्हिंग : थांबून श्वास घेण्याची कला…” – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – सौ. शोभा जोशी ☆

सौ. शोभा जोशी 

? वाचताना वेचलेले ?

☆ “स्लो लिव्हिंग : थांबून श्वास घेण्याची कला” – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – सौ. शोभा जोशी ☆

दररोज सकाळी अलार्म वाजतो, आपण डोळे चोळत उठतो आणि धावपळ सुरू होते — नोकरी, फोन, ई-मेल, मीटिंग्स, ट्रॅफिक, सोशल मीडिया… आणि रात्री थकून कोसळताना आपल्यालाच प्रश्न पडतो.

… “आज दिवसभर धावलो, पण खरंच *जगणं* झालं का?”

याच ठिकाणी सुरू होते “स्लो लिव्हिंग” ही सुंदर संकल्पना —

थोडं थांबणं, शांत श्वास घेणं आणि *आता* या क्षणात जगणं.

 *स्लो लिव्हिंग म्हणजे काय नाही? *

हे “आळशीपणा” नाही, “काम टाळणं” नाही आणि “सगळं सोडून डोंगरात जाऊन बसणं” तर मुळीच नाही.

स्लो लिव्हिंग म्हणजे — आयुष्य थांबवणं नाही, तर *त्याचा वेग स्वतः ठरवणं. *

*स्लो लिव्हिंग म्हणजे काय आहे? *

स्लो लिव्हिंग म्हणजे —

  1.  जाणीवपूर्वक जगणं. 
  2.  महत्वाच्या गोष्टींसाठी वेळ राखणं.  
  3.  प्रत्येक क्षणातलं सौंदर्य ओळखणं.  

उदाहरणार्थ –

सकाळी ऑफिसला जायचं आहे, म्हणून घाईत गाडी दामटतो. कारण उठायला उशीर झाला, रात्री मोबाईलवर स्क्रोल करत बसलो… पण जर थोडं लवकर झोपलो आणि सकाळी शांततेने उठलो, तर गाडीही हळू चालवता येते, मनही प्रसन्न राहतं. एवढं साधं आहे हे!

आपल्याला सगळं हवं असतं — नवी गाडी, नवा फोन, नवे कपडे…

पण एकदा मनाला विचारलं की, “खरंच ही गरज आहे का?”

उत्तर बहुतेक वेळा “नाही” असतं.

जसं ऑनलाइन शॉपिंग करताना अनेक वस्तू कार्टमध्ये टाकतो, आणि शेवटी विचार करतो — “खरंच हे आवश्यक आहे का? ”

तो विचार आला की विषय संपतो.

… गरजा मर्यादित केल्या की मन मोकळं होतं, आणि तेव्हाच शांत श्वास घेता येतो.

*स्लो लिव्हिंगचा मजेशीर भाग*

कधी कधी हे खूप साधं असतं —

* सकाळी चहाच्या कपातून येणाऱ्या वाफेकडे बघत पावसाचा सुगंध अनुभवणं.

* मुलांनी विचारलेल्या निरागस प्रश्नाचं उत्तर प्रेमाने देणं.

* मित्राला भेटताना मोबाईल बाजूला ठेवून मनमोकळ्या गप्पा मारणं.

– – या छोट्या क्षणांमध्येच आयुष्याचा खरा गोडवा आहे —

आणि त्यासाठी *एकही रुपया खर्च नाही. *

स्लो लिव्हिंग म्हणजे फक्त मंद गती नाही, तर *उद्देशपूर्ण गती* आहे.

आपल्याला का जगायचं आहे, काय महत्वाचं आहे — हे उमजलं की धावपळसुद्धा शांत वाटते.

जर तुमचा उद्देश आरोग्य राखणं असेल —

तर तुम्ही जेवण, झोप, व्यायाम यांना वेळ द्याल.

जर उद्देश मन:शांती असेल —

तर तुम्ही कामापेक्षा स्वतःकडे लक्ष द्याल.

आजच्या जगात स्लो लिव्हिंग का आवश्यक

आज “फास्ट” जगणं म्हणजे “स्मार्ट” समजलं जातं. “मला वेळ नाही” असं सांगणं म्हणजे प्रतिष्ठा वाटते. 

लोक सतत व्यग्र दिसतात, पण आतून थकलेली असतात.

फास्ट लाईफ देतं यशाचं बाह्य रूप, पण घेऊन जातं मन:शांतीचं मर्म. 

त्याउलट, स्लो लिव्हिंग करणारा माणूस बाहेरून शांत दिसतो, पण आतून समाधानी असतो.

तो प्रत्येक क्षणात जगतो, आणि म्हणूनच त्याचं जगणं पूर्ण वाटतं.

स्लो लिव्हिंग म्हणजे आयुष्याचा वेग कमी करणं नव्हे,.. तर मनाचा वेग कमी करणं. 

स्लो लिव्हिंग म्हणजे झाडासारखं — शांत, स्थिर, पण तरीही सतत वाढत राहणारं.

स्लो लिव्हिंग म्हणजे — पावसाच्या थेंबात, मुलाच्या हसण्यात, आणि गप्पांच्या ओघात आनंद शोधणं.

आणि सर्वात महत्त्वाचं —

स्लो लिव्हिंग म्हणजे स्वतःसाठी थांबून श्वास घेणं. 

थोडं थांबा… डोळे मिटा… आणि श्वास घ्या. 

कदाचित तुम्हाला जाणवेल —

याच क्षणात संपूर्ण आयुष्य दडलेलं आहे. 

… Think about it.

लेखक : अज्ञात 

प्रस्तुती: श्रीमती शोभा जोशी

मो ९४२२३१९९६२ 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆“तुम्हाला विनोदबुद्धी कुठून मिळाली?” – लेखक : पु. ल. देशपांडे ☆ प्रस्तुती – श्री सुनील देशपांडे ☆

श्री सुनील देशपांडे

? वाचताना वेचलेले ?

☆ “तुम्हाला विनोदबुद्धी कुठून मिळाली?” – लेखक : पु. ल. देशपांडे ☆ प्रस्तुती – श्री सुनील देशपांडे

ह्या प्रश्नाचे उत्तर मला सुचवणाऱ्याला मी इष्टेट लिहून देईन. मला वाडवडिलार्जित फक्त आजपर्यंत संधिवात मिळाला आहे. आजीला दमा होता, त्या वाटणीची मी अत्यंत आतुरतेने वाट पाहात आहे. विनोदबुद्धी कोण देणार?

ज्याने मला डोळे दिले (चष्मा वगळून- तो मी विकत घेतला.) त्याखेरीज ते दातृत्व मी आणखी कुणाच्या वाट्यावर जमा करू?

गणितातला कच्चेपणा, मी माझ्या एका मामाकडून मिळवला.

चित्रकलेतील अधोगतीला एक दूरचा चुलता जिम्मेदार आहे.

सिग्रेटी फुंकायचे व्यसन माझ्या एका आतेभावाने लावले.

इतिहासाचा तिटकारा इतिहासाच्याच गुरूजींनी निर्माण केला! त्यामुळे शिवाजीचा गुढगी रोग मी औरंगजेबापर्यंत नेऊन पोचवला आहे, आणि इंग्लंडच्या गादीवरच्या चार्लसबरोबर अनेक हेन्री मंडळींची मुंडकी तिमाही – सहामाहीत ह्या हाताने उडवली आहेत.

संगीताची आवड ही शेजारच्या घरात वेळीअवेळी पेटी बडवणाऱ्या एका इसमावर सूड म्हणून उत्पन्न करून घेऊन त्याची पेटी बंद पाडली.

नाटकात पहिली भूमिका मिळाली, ती ‘नरवीर तानाजी मालुसरे’ ह्या नाटकाच्या सोनावणे मास्तरांनी ‘डायरेक्शन’ केलेल्या प्रयोगात!

तानाजी मेल्यावर जे मावळे पळतात त्यांतला आघाडीवरचा मावळा म्हणून मराठी रंगभूमीला माझा चिमुकला पदस्पर्श झाला.

-“मूर्खांनो! तो दोर मी केव्हाच कापला आहे, ” 

हे सूर्याजीचे भाषण ज्या मूर्खांना उद्देशून होते त्यातला मी आघाडीचा मूर्ख!

तिथे देखील उजव्या विंगेत कड्याच्या दिशेला न पळता उदेभानाच्या महालाच्या दिशेला पळाल्यामुळे डाव्या विंगेत उभ्या असलेल्या सोनावणे मास्तरांनी उजव्या हाताने माझ्या डाव्या गालफडावर एक सणसणीत ‘डायरेक्शण’केलेले स्मरते.

सुटलेला कल्ला आणि जीव बालमुठीत धरून मी पुन्हा एकदा तलवार आणि मावळी पागोटे सांभाळीत उजव्या विंगेत पळताना वाटेत आडव्या पडलेल्या तानाजीच्या छातीवर पाय देऊन पळालो होतो. त्या आघाताने तो मेलेला तानाजी कोकलत जिवंत झाला.

असो; हे विषयांतर झाले.

विनोदबुद्धीचा उगम माझ्या मानेवरील चामखिळीप्रमाणे केव्हा झाला हे अजिबात स्मरत नाही.

लेखक : श्री. पु. ल. देशपांडे.

प्रस्तुती – श्री सुनील देशपांडे

मो – 9657709640

email : sunil68deshpande@outlook.com

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ एक दु:खद सत्य… – कवी : एक अनामिक मास्तर ☆ प्रस्तुती – श्री सुहास सोहोनी ☆

श्री सुहास सोहोनी

? वाचताना वेचलेले ?

☆ एक दु:खद सत्य… – कवी : एक अनामिक मास्तर ☆ प्रस्तुती – श्री सुहास सोहोनी ☆

विद्यालयाच्या जागेपायी

कुणीच इथं भांडलं नाही

अन् देवालयाच्या जागेसाठी

रक्त कमी पडलं नाही…

*

माझाच देव मोठा म्हणण्यात

रक्ताच्या नद्या वाहिल्या

अन् ज्ञानगंगा कोरडी पडत

शाळा इथे ओसाड पडल्या…

*

शाळा अजुनही तशीच आहे

पडक्या, तुटक्या भिंतींची

गरीब माझ्या देशामध्ये

उभी मंदिरं सोन्याची…

*

शाळे मधली दानपेटी

भरलेली कधी पाहिली नाही

अन् मंदिराची दानपेटी

रिकामी कधी राहिलीच नाही…

*

शाळेतला पालक मेळावा

पालकांवाचून राहून गेला

देवालयात चेंगराचेंगरीत

माणुस मात्र तुडवून मेला…

*

विद्येचं ज्ञान देऊन

गुरूजी गरीबच राहीला

अन् अंधभक्तांचं’ दान घेऊन

पुजारी धनवान गब्बर झाला…

*

खरंतर धर्म नावाचं पुस्तक 

शाळेत कधीच उघडत नाही

पण धर्माच्या नांवाशिवाय

देशात पानही हालत नाही…

 कवी : एक अनामिक मास्तर

प्रस्तुती – श्री सुहास सोहोनी

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ “दहा रुपयांच्या बदल्यात १३ लाख” – लेखक – अज्ञात ☆ प्रस्तुती – श्री अनिल वामोरकर ☆

श्री अनिल वामोरकर

📖 वाचताना वेचलेले  📖

☆ “दहा रुपयांच्या बदल्यात १३ लाख” – लेखक – अज्ञात ☆ प्रस्तुती – श्री अनिल वामोरकर ☆

शेठने नुकतंच दुकान उघडलं होतं. इतक्यात एक बाई आली आणि म्हणाली,

“शेठजी, हे घ्या तुमचे दहा रुपये. “

…. शेठ त्या गरीब बाईकडे प्रश्नार्थक नजरेने बघू लागला, जणू विचारत होता, “मी तुम्हाला दहा रुपये कधी दिले होते?”

बाई म्हणाली,

“काल संध्याकाळी मी तुमच्याकडून ७० रुपयांचं सामान घेतलं. मी तुम्हाला १०० रुपये दिले होते. पण तुम्ही ३० रुपयांच्या ऐवजी ४० रुपये परत दिलेत. हेच दहा रुपये घेऊन आले आहे. “

शेठने त्या दहा रुपयांच्या नोटेला कपाळाशी लावलं आणि गल्ल्यात ठेवत म्हणाला,

“एक गोष्ट सांगा ताई, तुम्ही सामान घेताना पाच रुपये कमी व्हावेत म्हणून किती घासाघिस करत होता! पण आता हे दहा रुपये परत देण्यासाठी आलात?”

बाई सहजपणे म्हणाली,

“घासाघिस करणं माझा हक्क आहे, पण एकदा भाव झाल्यावर कोणाचे पैसे खाणं पाप आहे. “

शेठ थोडा गोंधळला आणि म्हणाला,

“पण तुम्ही कमी पैसे दिलेच नव्हते. माझ्या चुकीमुळे तुमच्याकडे दहा रुपये जास्त गेले होते. तुम्ही ते पैसे ठेवले असते तरी मला काय फरक पडणार होता? असे दहा वीस रुपये किती वेळा जातात ओ!”

बाई शांतपणे म्हणाली,

“तुम्हाला फरक नाही पडला तरी माझ्या मनावर ओझं राहील शेठ. मी जाणूनबुजून तुमचे पैसे खाल्ले असं वाटले असते. म्हणून मी रात्रीच पैसे परत द्यायला आले होते, पण दुकान बंद होतं. “

शेठने विचारलं —

“तुम्ही कुठे राहता?”

बाई म्हणाली —

“मी स्टेशन जवळ राहते. “

हे ऐकताच सेठ थक्क झाला. तो म्हणाला —

“७ किलोमीटर दूरून फक्त हे दहा रुपये देण्यासाठी दोनदा आला आहात?”

बाई सहज म्हणाली —

“हो. कारण मनशांती हवी असेल तर असं करावं लागतं. माझा नवरा आता जिवंत नाहीये पण त्यांनी एकच शिकवलं — दुसऱ्याच्या हक्काचा एक पैसाही खाऊ नका. कारण माणूस गप्प राहू शकतो, पण वरचा देव कधीही हिशोब मागू शकतो. आणि त्या हिशोबाची शिक्षा माझ्या मुलांनाही मिळू शकते. “

इतकं बोलून बाई गेली.

बाई गेल्यावर शेठने लगेच गल्ल्यातून ३०० रुपये काढले आणि स्कूटीवर बसून दुसऱ्या दुकानात जातो. तो म्हणतो —

“प्रकाशजी, हे तुमचे ३०० रुपये घ्या. काल सामान घेताना हिशोबात जास्त झाले होते. “

प्रकाश हसत म्हणतो —

“जास्त झाले होते तर पुढच्या वेळी मी आलो असतो तेव्हा दिले असते. एवढ्या सकाळी पैसे द्यायला आलात?”

शेठ म्हणतो —

“पुढच्या वेळी तुम्ही आलात, तोपर्यंत मी मेलो असतो तर? तुम्हाला कधी कळलंच नसतं की माझ्याकडे तुमचे ३०० रुपये निघतात. म्हणून लगेच द्यायला हवे. देव कधी हिशोब मागेल सांगता येत नाही. त्या हिशोबाची शिक्षा माझ्या मुलांनाही मिळू शकते. “

शेठ निघून गेला, पण प्रकाशच्या मनात खळबळ उडाली.

कारण १० वर्षांपूर्वी त्याने एका मित्राकडून ३ लाख रुपये घेतले होते. पण पैसे दिल्यानंतरच्या दुसऱ्याच दिवशी मित्र मेला. त्याच्या कुटुंबाला पैशांबद्दल माहितीच नव्हती. त्यामुळे प्रकाशने कधी परत दिले नाहीत. मनात लोभ आला आणि तो शांत राहिला.

आता मात्र शेठचे शब्द — “देव कधी हिशोब मागेल सांगता येत नाही आणि त्याची शिक्षा मुलांनाही मिळू शकते” — हे त्याच्या अंतःकरणाला हादरवून गेले.

दोन-तीन दिवस प्रकाश खूप तणावात होता. शेवटी त्याचा अंतरात्मा जागा झाला. त्याने बँकेतून १३ लाख रुपये काढले आणि मित्राच्या घरी गेला.

मित्राची बायको घरातच होती. ती मुलांबरोबर बसली होती. प्रकाश तिच्या पायावर पडला आणि पैसे तिच्या हाती दिले.

जी बाई घरकाम करून, झाडू-पोछा करून मुलांना वाढवत होती, तिला हे १३ लाख खूप मोठं वरदान होतं. तिच्या डोळ्यांतून अश्रू वाहू लागले. तिने प्रकाशला मनापासून आशीर्वाद दिले.

आणि ही बाई दुसरी कोणी नव्हे, तर तीच होती जी शेठकडे दहा रुपये परत देण्यासाठी दोनदा आली होती.

.. मेहनत आणि प्रामाणिकपणाने खाणाऱ्यांची देव परीक्षा घेतो, पण कधीही त्यांना एकटे सोडत नाही.

.. देवाच्या घरात उशीर असतो पण अंधार कधीच नसतो.

तुम्हाला काय वाटते ?? जरूर कळवा..

लेखक : अज्ञात

प्रस्तुती – श्री अनिल वामोरकर

अमरावती

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ कॉल हिम एडी… लेखिका : सुश्री कल्याणी बापट केळकर ☆ प्रस्तुती – सुश्री प्राची जोशी ☆

सुश्री प्राची जोशी

? वाचताना वेचलेले ?

☆ कॉल हिम एडी… लेखिका : सुश्री कल्याणी बापट केळकर ☆ प्रस्तुती – सुश्री प्राची जोशी ☆ 

सुश्री कल्याणी बापट केळकर

काल वर्तमानपत्रात एक बातमी वाचली आणि मनात तो विषय दिवसभर सतत घोळत होता. त्या बातमीत सांगितले होते की संवादाला आसुसलेली एक सिनियर सिटीझन व्यक्ती कुठलेही आकडे जुळवत फोनवर डायल करीत कुठलाही अनोळखी नंबर वर फोन करीत संभाषण वाढवून बोलणे वाढवत बसायचे. त्यातील बरेच जण उद्वेगाने फोन ठेऊन द्यायचे पण काही जण मात्र आत्मीयतपूर्वक संवाद साधायचे. हे एवढे एकच टॉनिक ह्या व्यक्तीसाठी तो दिवस घालवायचा एक नामी उपाय होता.

बरेच जण म्हणतील त्या व्यक्ती मध्ये दोष असेल त्याने माणसे जोडून ठेवली नाही. पण वस्तुस्थिती अगदी वेगळी होती. खूप जास्त दीर्घायुष्य त्या व्यक्तिला शाप वाटत होतं. त्यांची आपली जवळची माणसे, जवळचे नातेवाईक आपापल्या कामात व्यस्त असायचे, वयोमानामुळे डोळे काम करीत असल्याने वाचन, टीव्ही पण बराच कमी झाला होता. ह्यावरून ही समस्या किती मोठी आहे हे लगेच लक्षात आले. ह्यावरून मला ह्या विषयावरची एक पोस्ट आठवली आज तीच पोस्ट परत एकदा.

काही पुस्तके ही कितीदाही वाचली, किंवा काही चित्रपट, शॉर्ट फिल्म ह्या कितीदाही बघितल्या तरी परत परत वाचावेसे वा बघावेसे वाटतात. युगंधर, मृत्युंजय, श्रीमानयोगी, ययाती ह्यासारखी पुस्तकं तरं कायम जवळ हवी अशी वाटतात, जेव्हां वेळ मिळेल तेव्हा हवे ते पान काढून वाचत बसावं. अंगुर हेराफेरी ह्या सारखे विनोदी चित्रपट केव्हाही फ्रेश करुन टाकतात.

अशीच एक शार्टफिल्म परत बघावीशी वाटली. यु ट्यूब. वर “काँल हीम एडी” नावाची ही एक खूप छान शाँर्टफिल्म परत काल बघितली. आजकाल एकापेक्षा एक उत्कृष्ट शाँर्टफिल्म बघायला मिळतात, आणि ते पण अगदी घरबसल्या. आधुनिक तंत्रज्ञानाची कमाल.

ह्या फिल्ममध्ये मध्यवर्ती भुमिकेत संजय सुरी आणि ईशा चोप्रा हे दोघेही कसलेले कलाकार चमकले आहेत. संजय सुरी ह्यांचा अभिनय नेहमीसारखाच दर्जेदार परंतु नवोदित ईशा त्यांच्यापुढे कुठेही कमी किंवा फिकी पडली नाही हे ह्या फिल्मचे वैशिष्ट्यं.

ह्या फिल्मची संपूर्ण संकल्पना “टू कडल्” म्हणजे “कुशीत घेणे”ह्यावर आधारलेली आहे. संपूर्ण फिल्मचा भर हा भावनांचा निचरा होणे किती अत्यावश्यक आहे हे समजविण्यावर बेतलेला आहे.

संजय सूरी हा एका मोठ्या पदावरील अतिशय मानाच्या नोकरीमधून निवृत्ती घेतो आणि कडलिंग म्हणजेच समोरच्या व्यक्तीचा भावनात्मक ताबा घेऊन त्याला कुशीत घेऊन त्याच्या मनात साठलेल्या भावनांना मोकळी वाट करून देऊन समोरच्या व्यक्तीच्या दुःखाचा निचरा करणे हाच त्याचा प्रमुख उद्देश असतो. अर्थात हे काम तो पूर्णपणे व्यावसायिक तत्वावर करतो आणि ह्या कामात तो प्रचंड यशस्वीपण होतो. हा त्याचा एक उपचारांचाच भाग असतो. तो समोरच्याला विश्वासात घेऊन समजावून सांगतो की ह्या मागे त्याच्या मनात कुठलीही वैषयिक भावना अजिबातच नसणार.

आपल्याकडे जुन्या परंपरांचा बराच पगडा असल्याने कोणत्याही एका स्त्री पुरुषाची जवळीक, मिठी, हस्तांदोलन, मैत्री ही फक्त आणि फक्त वैषयिकदृष्टीकोनातूनच त्या विशिष्ट नजरेने बघितली जाते. प्रत्येक देशात, प्रातांत काही चांगले, काही वांगले ह्याची सरमिसळ असते. त्या मुळे स्त्रीपुरुष मैत्रत्वाचे संबंध ह्या बाबीवर पाश्चात्य देशामध्ये बराच अभ्यास झालेला असल्या कारणाने तिकडे ह्याकडे निव्वळ वैषयिक भावनेने न बघता सहानुभूती, प्रेम, मनाशी जुळलेले मनाचे चिवट धागे ह्याचा विचार करून मग कुठल्याही निष्कर्षाप्रत ती मंडळी पोहोचतात.

ह्या फिल्ममध्ये संजय सूरी हा वयाची तरुणाईचा भर ओसरल्यावर ह्या व्यवसायात पूर्ण अभ्यासाच्या ताकदीने उतरल्याने तो मनात कुठलेही विकल्प न धरता प्रामाणिकपणे उपचाराचा हा टप्पा तो यशस्वीरित्या पार पाडीत असतो.

“जहाँ न बुलबुल नगमे गाये जहा न फसले बहारा” ह्या ओळींप्रमाणे आयुष्यातील एक सुरवातीच्या वयाचा टप्पा ओलांडल्यानंतर वैषयिक भावना जाऊन त्याची जागा फक्त मानसिक, भावनिक प्रेम, सहानुभूती घेतं ह्यावर दुर्दैवाने आपल्याकडे विचारच होत नाही, कदाचित झापड लावल्यासारखी सब घोडे बारा टक्के ह्या नुसार त्याकडे ह्याच नजरेने बघण्याची आपल्याला सवय लागलेली असते. असो तर ह्या उपचारांवर विशेष विश्वास नसलेली एक पत्रकार म्हणजेच ईशा चोप्रा ही सुरींची मुलाखत घेण्यासाठी येते. ह्या थेरपीवर विश्वास नसल्याने तिची सुरवातीची स्थिती ही खूप अवघडल्यासारखी असते. नंतर हळूहळू एडी तिला विश्वासात घेउन तिच्याशी मनमोकळं बोलून आणि तीला मनमोकळं बोलायला लावून आपल्या भावना उलगडवायला कुशीत मिठीत घेऊन, सहानुभूती, प्रेम ह्या जोरावर कसे आश्वस्त करतो हे खरतर प्रत्यक्ष बघण्यासारखेच. हेच ह्या फिल्मच्या यशाचे गमक आहे. अप्रतिम. रंगवलाय हा प्रसंग दोघांनीही. उपचारांमध्ये ईशा स्वतःच्या वडीलांचा केलेला रागराग आणि त्यांच्याकडे एकाच अँगलने बघून वडीलांना कायम दोषी, अपराधी मानत आलेली ईशा त्यांच्या मृत्यू नंतर मात्र स्वतः ला दोषी मानायला लागते. आणि हे गिल्ट च तिला भावनांचा निचरा न झाल्याने नीट जगूही देत नाही आणि मरु ही देत नाही. मात्र मुलाखती बरोबरच चाललेला हा उपचारांचा प्रयोग कमालीचा यशस्वी होऊन ईशा आपल्या भावनांना वाट करुन देऊन मोकळी होते.

दुर्दैवाने संजय सूरी जे ह्या उपचारांनी सगळ्यांना ह्या मानसिक नैराश्यातून बाहेर काढत असतात त्यांना स्वतः ला हा भावनांचा निचरा करायला जवळच कोणीही नसतं. ते शेवटी आपल्या मृत पत्नी व मुलाच्या कबरीपाशी जाऊन स्तब्ध होतात असा शेवट होतो.

म्हणजेच काय तर प्रत्येकाच्या मानसिक गरजा ह्या खूपच वेगवेगळ्या असतात. कोणाला मानसिक आधाराची खूप गरज असते तर काही एकटे पण हा प्रसंग कोणाच्याही मदतीशिवाय तोलू शकतात. पण एक नक्कीच अशी सरसकट अभ्यासपूर्ण मदत आपल्याकडे सर्रास मिळेल तेव्हा आत्ता सारख्या आत्महत्या करण्याचे प्रमाण बरेच कमी होईल.

लेखिका : सुश्री कल्याणी बापट (केळकर)

बडनेरा, अमरावती

प्रस्तुती : सुश्री प्राची जोशी 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ ‘अंधार…’ – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती : डॉ ज्योती गोडबोले ☆

डॉ ज्योती गोडबोले

? वाचताना वेचलेले ?

☆ ‘अंधार…‘ – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती : डॉ ज्योती गोडबोले

हल्ली सगळ्यात मोठा प्रॉब्लेम कुठला असेल तर तो म्हणजे कधी अंधारच होत नाही. सगळीकडे इन्व्हर्टर असतात आणि अगदीच नसले तरी लोकं दुसऱ्या सेकंदाला मोबाईलचा लाईट लावतात आणि अंधार घालवतात.

…. त्यामुळे दुसऱ्या क्षणी तुम्हाला तुमच्या पुढचं, आजूबाजूचं दिसू लागत. पण तिथेच खरा प्रॉब्लेम आहे.

मला आठवतं आहे, आमच्या लहानपणी इन्व्हर्टर, मोबाईल नव्हते. मेणबत्त्या, कंदील हे ऑपशन्स होते. पण कधी रात्री लाईट गेले तर दुसऱ्या सेकंदाला आजीचा आवाज यायचा.

“ कुणीही जागचे हलू नका. आहे त्या जागेवर बसून आपापले डोळे दोन मिनिटे घट्ट बंद करा ‘ आणि आम्ही डोळे घट्ट मिटायचो. मग दोन मिनिटांनी आजीचा आवाज यायचा ‘ आता हळूहळू डोळे उघडा आणि आपोआप अंधारात दिसू लागेल. ” आणि खरंच मगासपेक्षा आता थोडं दिसू लागलं असायचं. मला अजूनही याचं अप्रूप आहे.

मुळात अंधारात असताना डोळे कां मिटायचे, त्याने काय होणार पण डोळे मिटून उघडले की दिसू लागायचं हे खरं. मला वाटतं की जुन्या पिढीला हीच सवय होती कि अंधारात असलो की अजून घट्ट डोळे मिटून आत डोकावायचे. स्वतःचे डोह धुंडाळायचे. आपल्या जाणिवा, नेणिवाचे झरे मोकळे करायचे आणि मग वाटा स्पष्ट होतं असाव्यात-दिसत असाव्यात. आणि आपणच शोधलेली आपली वाट असेल तर मग ती सुकर होते, त्याचं ओझं होत नाही आणि त्या वाटेवरचा प्रवास समाधान देणारा असतो.

माझ्या आजोबांचा पण लाईट गेले की एक आवडता डायलॉग होता. अंधारात रस्ता दिसतो आणि उजेडात फक्त खड्डे दिसतात. दिवे येईपर्यंत तुमचे रस्ते शोधा. लहानपणी मला हा विनोद वाटायचा पण हल्ली आजोबा आठवतात, त्यांचं वाक्य आठवतं आणि आता कुठे त्याचा अर्थ पन्न्नास वर्षांनी थोडाफार कळतो.

स्वतःच्या तरुणपणी परिसस्थिती’च्या अंधारात त्यांनी कष्ट सोसले, वार लावून जेवले, शिकले, नोकरी केली, आपला रस्ता शोधला. स्वतःच्या पोटाला चिमटा काढून मुलांना इंजिनिअर केलं, त्याची फळं आम्ही उपभोगतोय. कधी नव्हे तर परवा खूप वेळ लाईट गेले, इन्व्हर्टर बंद पडला तर किती चिडचिड. डेटाचा स्पीड थोडा कमी झाला आणि लॅग आला तर त्रागा. पिझ्झा अर्ध्यातासात डिलिव्हर नाही झाला तर फ्री ची मागणी. उजेडात फक्त खड्डे दिसतात हेच खरं.

पण हल्ली अंधारच होत नाही. मुळात अंधारच माहित नाही. आजूबाजूला सारखा लाईट असतो पण तो एनलायटन करू शकत नाही आणि डोळेच कघी न मिटल्यामुळे आत डोकावायची वेळच येत नाही.

इन्व्हर्टर-मोबाईलच्या लाईट ने आजूबाजूचं दिसतं आणि फक्त आजूबाजूचं दिसलं तर फक्त स्पर्धा वाढते, पण वाट काही सापडत नाही. वाट सापडायची असेल तर आत डोकावता आलं पाहिजे. आपापले डोह धुंडाळता आले पाहिजेत. अंधारात तळाशी पोहोचणं सोपं होतं असावं. म्हणून अधून मधून थोडा मिट्ट अंधार हवा आहे.

…… खरंय ना?

लेखक : अज्ञात 

प्रस्तुती : डॉ ज्योती गोडबोले

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ स. न. वि. वि. … – लेखक : अज्ञात ☆ सौ. अंजली दिलीप गोखले ☆

सौ अंजली दिलीप गोखले

📖 वाचताना वेचलेले 📖

☆ स. न. वि. वि. … – लेखक : अज्ञात ☆ सौ. अंजली दिलीप गोखले

सुरुवातीला स. न. वि. वि. असे लिहिल्यामुळे मी काही सांगतोय किंवा कशाबद्दल तरी आमंत्रण देतोय, असे कदाचित वाटू शकेल.

पण….

अशी सुरुवात करुन लिहिण्याचा मोह आवरला गेला नाही.

*हल्ली लग्नपत्रिका, आमंत्रण पत्रिका यावरच असे लिहिलेले बघायला मिळते. एरवी असे शब्द लिहिले जात होते, हे सुध्दा विसरायला झाले आहे. *

उतारवयात स्मरणशक्ती कमी होते म्हणून काही गोष्टी विसरायला होतात. पण आता असे शब्द वाचण्यात आणि लिहिण्यात येत नसल्याने विसरायला झाले आहेत.

*खरेच मोबाईलसारख्या सहज संभाषण करता येणाऱ्या वस्तू उपलब्ध झाल्यामुळे, नवनवीन शोधामुळे काही गोष्टी सोप्या झाल्या असल्या, तरीही पत्रलेखन मात्र जवळपास बंदच झाल्यामुळे पत्रात लिहिले जाणारे काही शब्द लुप्त झाल्यासारखे वाटतात. *

आज सहज अशा काही शब्दांची आठवण झाली…….

*•.. • श्री •.. •* लिहून पत्राची सुरुवात.

*श्री. रा. रा. * – श्रीमान राजमान्य राजश्री.

*स. न. वि. वि. * – सप्रेम नमस्कार विनंती विशेष.

*तीर्थरुप* आई / बाबा.

*शि. सा. न. * – शिरसाष्टांग नमस्कार.

या सारखे शब्द वाचायलाच मिळेनासे झाले आहेत.

*कळविण्यास आनंद होतो की, असे लिहून पत्राची सुरुवात झाली, तर पुढे आनंदाची बातमी आहे, म्हणून पत्र अक्षरशः अधिरतेने वाचले जायचे. (दोन वेळेस)*

पत्राच्या शेवटी लिहिले जाणारे…….

– *कळावे, लोभ असावा. *

– *आपला. *

– *तुझाच/ तुझीच (किती रोमँटिक! )*

– *आपला आज्ञाधारक*

– *मो. न. *

– *ल. अ. उ. आ‌. *

– *छो. गो. पा. * 

– *मोठ्यांना नमस्कार, *

– *लहानांना अनेक उत्तम आशिर्वाद*

– *छोट्यांना गोड पापा, *

 *असे लिहून तान्हुल्यांची सुध्दा आवर्जून आठवण ठेवली जायची. यात गोड पापा असे वाचताना सुद्धा खरेच लहानांचा गोड पापा घेतला जातोय असा भास व्हायचा. *

हे आणि या सारखे शब्द शाईच्या पेनासारखेच झाकण (टोपण) लावून जवळपास कायमचे बंद झाले आहेत असे वाटते.

*त्यामुळेच असे आपलेपणा जपणारे शब्द पेनने कागदावर उतरण्याचे थांबलेच नाहीत, तर बंद झाले आहेत. *

पत्र लिहून संपविताना एखादी गोष्ट आठवली तर *ता. क. * (ताजा कलम) असे लिहून उरलेल्या जागेत ती मावेल अशा अक्षरात लिहिली जायची. त्यात सुध्दा गंमत वाटायची.

*कदाचित शाईमुळेच त्या शब्दात आपलेपणाचा ओलावा येत असावा. नंतर बॅाल पॅाईंट पेनमुळे तो ओलावा कमी होत गेल्याचे जाणवले. *

आता तर मोबाईलवरच टाईप केल्याने ओलावा सुध्दा काही वेळा कृत्रिम वाटायला लागतो. खरेच या शाईने लिहिलेल्या अशा शब्दात एक आपलेपणाचा गोडवा होता.

*पत्राची सुरुवात यापैकी कशानेही झाली, तरीही ते सुद्धा वाचलेच जायचे. आजच्या ई मेल, व्हॅाटसअप, फेसबुक च्या जमान्यात या शब्दांची मजा हरवली आहे. *

पत्रांच्या ऐवजी आता ई-मेल येतात. यात सुध्दा, Dear, Sir/Madam, Respected Sir/Madam अशी सुरुवात आणि Regards, Yours असे लिहून शेवट होतो. यात आपलेपणा जाणवतच नाही. कार्यालयीन आणि कोरडे वाटतात हे शब्द. त्यात नात्यातला ओलावा नाहीच.

*Yours faithfully यापैकी फेथफुली वर तर मला फुलीच (X) माराविशी वाटते. * 

*यातही स. न. वि. वि. सारखेच नुसतेच GM, GN असे लिहिण्याची सवय आहे. पण सुप्रभात, शुभ रात्री, शुभ रजनीची मजा GM (गम) GN (गन) मध्ये नाही. *

आजकाल फोनवरच बोलणे (त्यातही काही वेळा व्हिडिओ काॅल) होत असल्याने साष्टांग नमस्कार, आशिर्वाद, गोड पापा अशा शब्दांच्या ऐवजी मग *”काय? कसे काय? बाकी सगळे ठिक आहेत ना? “* असे बाकी (चे) विचारुनच नात्यांची शिल्लक (बाकी) विचारली जाते किंवा पाहिली जाते.

पत्र आले की आनंद व्हायचाच, पण मोठे पत्र (अंतर्देशीय) आले की ते व्यवस्थित उघडून (खरेतर फोडून) रविवारच्या पुरवणी सारखे त्याचे वाचन व्हायचे. पण आता हे सगळे हरवले आहे असे वाटते.

आपला / आपली नम्र,

– – – – 

लेखक : अज्ञात 

प्रस्तुती : सौ. अंजली दिलीप गोखले 

मोबाईल नंबर 8482939011

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ तिचं जग… तिचं अवकाश… – लेखिका : सुश्री पुष्पा गोटखिंडीकर ☆ प्रस्तुती – सौ. गौरी गाडेकर ☆

सौ. गौरी गाडेकर

📖 वाचताना वेचलेले 📖

☆ तिचं जग… तिचं अवकाश… – लेखिका : सुश्री पुष्पा गोटखिंडीकर ☆ प्रस्तुती – सौ. गौरी गाडेकर

पुतण्याच्या लग्नाच्या निमित्ताने मला अमेरिकेहून वीस दिवसांसाठी भारतामध्ये यायला मिळणार होते. त्यामुळे मी फारच खुश होते. भारतात येण्यासाठी विमानात बसले आणि माझ्या डोक्यात विचार चक्र सुरू झाले. भारतात गेल्यावरती सासर.. माहेर नातेवाईकांच्या भेटीगाठी, मित्रमैत्रिणींच्या भेटीगाठी, बँकांची कामं या सगळ्यांचा विचार करता करता सर्वात महत्त्वाचं म्हणजे लीलू मावशीची प्रथम भेट घ्यायची, असं मनानं मी निश्चित केले. लीलु मावशी माझी अत्यंत प्रिय मावशी, लाडकी मावशी. तिचाही माझ्यावर तेवढाच जीव. पण सहा महिन्यांपूर्वी तिच्या मिस्टरांचे नारायण काकांचे अकाली दुःखद निधन झाले. कोणताही आजार नाही काही नाही, चांगले हिंडते फिरते. अचानक हार्ट अटॅक यावा काय अन् मृत्यू यावा काय! ही बातमी ऐकून मी तर फार खचून गेले होते. मावशीला अमेरिकेतून फोन केला होता पण माझ्याच्याने जास्त बोलवले गेले नाही. तिचं सांत्वन कोणत्या शब्दात करावं ते मला सुचत नव्हतं. मी फोनवर नुसती रडत राहिले होते आणि म्हणून आता पुण्यात गेल्यावर पहिल्यांदा लीलु मावशीची भेट घ्यायची असे मी मनाशी पक्क ठरवलं.

ठरल्याप्रमाणे मी पुण्यात पोहोचल्याबरोबर दुसऱ्या दिवशी मावशीकडे गेले. दार उघडताच तिने माझे हसून स्वागत केले. मावशी जशी होती तशीच छान दिसत होती. तिच्या राहणीमानात मला काही फरक जाणवला नाही. कपाळाला कुंकू, गळ्यात मंगळसूत्र, साडीला पिन अप केलेलं. तिला बघून मला छान वाटलं.

मला म्हणाली, “आत्ताच मी वृद्धाश्रमातून आले आहे. ” (वृद्धाश्रमातून हा शब्द ऐकताच माझ्या मनात चर्र झाले अन् असंख्य विचार दाटून आले. बापरे! मावशीला संजय दादानी वृद्धाश्रमात ठेवले. किती नालायक आहे! संजयदादा असं करेल असं मुळीच वाटलं नव्हतं. किती स्वार्थी असतात ना माणसं! )

माझ्या कपाळावरील आठी आणि माझा तोंडाचा झालेला आ बघून मावशी म्हणाली, “अग, इथे जवळच सावली नावाचा एक वृद्धाश्रम आहे. तिथल्या आजीआजोबांना मी भजन शिकवायला जाते. त्यांची दहा-बारा भजने तयार झाली आहेत आणि आता त्यांना नवरात्रात ठिकठिकाणी भजनं म्हणायला बोलवलं आहे. म्हणून त्यांची मी सध्या रोज प्रॅक्टिस घ्यायला जाते.

सगळेजण खूप खुश आहेत. मलाही त्यांच्या चेहऱ्यावरील आनंद पाहून खूप छान वाटते आणि माझे दुःख विसरायला मला मदत होते. “

शनिवार रविवार माझ्याच घरी ४ ते ६ या वेळात संस्कार वर्ग घेते. १५-२० मुले येतात. लहान मुलांच्यात वेळ चांगला जातो बघ. आणि इथे मागच्याच गल्ली मध्ये ‘यशस्वी फाउंडेशन ‘नावाची एक सामाजिक संस्था आहे. तिथे इयत्ता दहावी मधील जी मुले अभ्यासात थोडी कच्ची आहेत आणि आर्थिक दृष्ट्या मागास आहेत, अशा मुलांना कोणतेही मानधन न घेता इंग्लिश, गणित शिकविण्यासाठी मी रोज दोन तास तेथे जाते. खर सांगू का शिक्षकी पेशा हे मी स्वीकारलेलं व्रत आहे आणि सेवानिवृत्तीनंतर ते या निमित्ताने निभावण्याचा मी प्रयत्न करत आहे. अग, हे गेल्यानंतर १५ दिवसातच मी माझ्या सामाजिक कामांना वाहून घेतले. “

“किती छान ग मावशी. छान बिझी ठेवलयस स्वतःला. “

“अग मनु, जाणारा जातो म्हणून मागे राहणाऱ्यांनी किती दिवस रडत राहायचे? मरण तर एक ना एक दिवस येणारच आहे. ते तर न मागताही मिळणार आहे. मग जोपर्यंत जीवात जीव आहे, तब्येत चांगली आहे तोपर्यंत आपल्या आवडीचं काम करावं असा विचार करून मी *पुनश्च हरी ओम* सुरू केलं. चल आता आपण जेवण करून घेऊ या. मी तुझ्या आवडीच्या पुरणपोळ्या सकाळीच करून ठेवल्या आहेत. “

मावशी, स्वयंपाकाला बाई ठेवली आहेस का? असं मी विचारताच मावशीने फणकाऱ्याने उत्तर दिले, “स्वयंपाकाला बाई कशाला ग? मला काय धाड भरली आहे? रोज सकाळ संध्याकाळ ताजा स्वयंपाक करते. सकाळी नऊ वाजता नाष्टा करते. एकदा केलेला नाष्टा आठ दिवस रिपीट होता कामा नये असा माझा कटाक्ष असतो. माझं रूटीन व्यवस्थित चालू आहे. बागेत एक तासभर काम करते. झाडांशी बोललं ना की मन छान प्रसन्न राहते. माझाही वेळ जातो आणि तब्येत चांगली राहायला मदत होते ना. मैत्रिणी ही भरपूर आहेत. अधून मधून भटकंती चालू असते. भरपूर वाचन लेखन चालू ठेवलय. रोज सकाळी योगा करते, देवाची पूजाअर्चा, पोथी वाचनही चालू असते. त्यामुळे एकलपण जाणवतच नाही बघ.

संजय आणि धनंजय.. एक पुण्याला एक मुंबईला असले तरी दोघेही अधून मधून मला भेटायला येतात. मीही त्यांच्याकडे माझ्या सवडीनुसार जाते. त्यांनी मला बजावले आहे आई, तू आम्हाला जशी होतीस तशीच आनंदी हवी आहेस. दोघी सूना नातवंडेही खूप काळजी घेतात माझी. आणखी काय हवे? “

“खरंय मावशी, दुःखातून तू सुखाचा शोध घेतला आहेस. मला तुझा जीवनाकडे बघण्याचा सकारात्मक, आनंदी दृष्टिकोन फारच आवडला. तू खऱ्या अर्थी गीता जगली आहेस मावशी! “

मावशीशी गप्पा मारत मारत सुगरण असलेल्या माझ्या मावशीच्या हातच्या पुरणपोळ्या खाऊन मी तृप्त झाले होते. आणि दुःखातून स्वत:ला सावरून ती करत असलेले सामाजिक काम पाहून मी खरोखरच भारावून गेले होते.

लेखिका : सुश्री पुष्पा गोटखिंडीकर

प्रस्तुती: सौ. गौरी गाडेकर 

संपर्क – 1/602, कैरव, जी. ई. लिंक्स, राम मंदिर रोड, गोरेगाव (पश्चिम), मुंबई 400104.

फोन नं. 9820206306

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ झणझणीत मिसळ… – लेखिका : सौ. भारती भाईक ☆ प्रस्तुती – सौ. मीनल केळकर ☆

सौ. मीनल केळकर

📚 वाचताना वेचलेले 📖

☆ झणझणीत मिसळ… – लेखिका : सौ. भारती भाईक ☆ प्रस्तुती – सौ. मीनल केळकर ☆

संपली दिवाळी…. आता मात्र ऐरणीवरचा प्रश्न…. उरलेले फराळाचे सुयोग्य समापन कसे करावे…कोण सायास घेऊन तयार केलेली. ती समस्त अंग बांध्याची शेव.. ती खारी बुंदी… ती खारी शंकरपाळी…. चिवडा… यांचं करावं काय?… नव्याची नवलाई संपलेली असते…. दिलेली डिश साभार परतत असते…. मग या अती मेहनत घेऊन केलेल्या जिन्नसांना योग्य पध्दतीने मार्गी लावणं यायला हवंच…… मग काय.. ?… मिसळ आहे ना…. सर्वांवर रामबाण उपाय…. रविवार एखादा उमलून यावा… नि अवचित बेत मिसळीचा ठरावा… असं अजिबात नाही हं… पूर्वतयारी लागतेच.. मिसळ म्हणजे उचलली जीभ लावली टाळूला… तसला झटपट अंगलट… मुखलट म्हणूया …. येणारा प्रकार नाही. तर जोजवून जोजवून शिजवून सामोरा येणारा प्रकार. बेत ठरायचा आदल्या दिवशी आणि मग मात्र पूर्वतयारी ला लागावं लागत ….. सर्व प्रथम कडधान्याला डब्यातून जागं करुन त्यांना “चला वीर जवानांनो…. कर्तव्यपूर्तीची वेळा आली…”म्हणत पाण्यात डुंबविणे ओघाने आलंच. रात्रीच घट्ट सायीखाली निवांत निजलेल्या दूधाला दह्याचं नैमित्तिक मिलन घडवून आणत विरजायला ठेवावं लागतं. विरजतांनाच अर्धा चमचा माधुर्य घातलं तर क्या कहने… । सकाळी घट्ट, गोडूलं, सायीचं दही तयार. वास्तविक याची डीशमध्ये सर्वात शेवटी वर्णी लागते…. पण तयारी सर्वात आधी करावी लागते.

पहाटे पहाटे उठायची काही गरज नसते. अंमळशाने उठुन मिसळीच्या तयारीला लागता येतं… इथे बहुतेक सुगरणींनी निःश्वास सोडला असेल. खमंग फोडणीसाठी लागणारं शस्त्रसाहित्य पुरेसं गोळा करावं… नि गँसवर पातेलं चढवावं…. गरम तेलात झणझणीत फोडणी देऊन कडधान्य टाकावं… मीठ पेरीत आमचूराचा स्वाद घालावा.. नि कुकरला दणदणीत पाच सहा शिट्ट्या कराव्या.

आता तुम्ही म्हणाल.. यात काय विशेष? हे तर आम्ही नित्य करतोच… पण थांबा हं… इथवर लीलया पाकसिध्दी करणाऱ्या ललनांनो… खरी लढाई यानंतरच बरं… म्हणजे चवीने रसनेवर चढाई करावी असं वाटत असेल… तर ही लढाई लढावीच वागते. उसळ नीट बोटचेपी शिजली तरी पातेल गँसच्या डोईवरुन काढू नये…तसंही गँसला सवयच असते हो याला त्याला डोक्यावर घेऊन मिरवायची….. तर तसंच राहू द्यावं…. एकीकडे खास कच्च्या मसाल्याचं वाटण घालून झणझणीत रस्सा फोडणीस घालावा… इथे चवीढवीचं गणित मात्र चपखल जमावयास हवे…. न कम न जादा… हो तडके का इरादा….. चटकदार मिसळ सर्वस्वी या रश्श्यावरच अवलंबून असते.

आता मात्र तुमचा रसिक पदर कंबरेला खोचायलाच हवा… चला…. एक एक जिन्नस जमवायला घ्या… अंमळशाने उठल्याची अर्धी कैफ तर ही तयारीच घालवते… कांदे मध्यमपेक्षा जरा बारीक कापून घ्यावे…. खूप बारीक कापलेले असतील… तर ते रश्श्यात नेस्तनाबूत होऊन हवी ती कचर कचर चव चाखता येत नाही हो…. … तर साधारण चार कांदे कापावेत…. कांद्याने शंभरी ओलांडली तरही आपण चवीपर्यंत मजल मारण्यासाठी… अशा नाही तर तशा कारणाने नयनी नीरेस येऊ द्यावे…. भले हो जादा दाम…. पूरा करेंगे तडके का काम…. … अशा बाणेदारपणे कांदे कापून हातावेगळी करावी… त्यानंतर हिरवीगार कोथिंबीरीचे पाय कडाकडा मोडून तिला मात्र बारीक कापावी…. दोन तीन प्रकारच्या चिवड्यांचे, घरच्या चिवड्याशी भरत मिलाप घडवून आणत, त्यांची गळाभेट मोठ्या डब्यात ठेवावी…. सडपातळ, मध्यम, मोठी… अशा….. सर्वच कँटेगिरीच्या शेवेला समान योग्य मान देत बाऊलमध्ये काढावेत… उगाचच बारीक शेव जाड शेवेकडे तिरपा कटाक्ष टाकीत हसली… नि पुटपुटली…”काय बाई जाड ध्यान.. “तरीही जाड्या शेवेसह आपणही दुर्लक्ष करावे……. फ्रिजमध्ये पहाटेसच ठेवलेलं नि तिथे ते निवांत AC मध्ये नीजलेलं गोडुलं दही काढून घ्यावं… त्याला अजिबात कल्पना नसते…. आपला आता लवकरच कडेलोट होऊन उकळत्या रश्श्यावर घालणार याची…. अज्ञानातलं सुख तयाला जरा लाटू द्यावं…. त्याला थोडं तसंच सुस्ताऊ द्यावं….

मिसळीची डिश तयार करायला घ्यावी.. भैय्या स्टाईलने प्लेटमध्ये मुबलक मोठ्या हाताने उसळ घालावी. ती तिच्या मनाविरुद्ध पातेल्यातून काढल्यामुळे अद्याप धुसफुसत असेल… आपण लक्ष देऊ नये…… मग चिवड्यांचे सर्व प्रकार हसत खेळत तयावर सोडावीत…….. मग सर्वसमभाव दर्शक सर्वच प्रकारच्या शेवेस… सेवेत घेत आनंदाने समोर सरकत मिसळीवर पहुडावी…पिवळीधम्म खारी बुंदी शिंपडावी….. मग मात्र सर्वांच्या भेटीस उत्सुक असलेल्या, आणि म्हणून अत्यानंदाने आनंदाच्या उकळ्या फुटणाऱ्या रश्श्याची अखेर भेट घडवून आणावी…. नीजलेलं, आळसावलेलं दही आता पुरेसं जागं झालं असेल… त्याला पाचारण करुन प्लेटमध्ये घालावं… ते कुरबुरेल.. पण गय न करता… लगेचच कांदे घालून त्याचं तोंड चूप करावं…. त्याच्या जोडीला हिरवीगार कोथिंबीर घालून लगेचच खवैय्यांच्या हवाली प्लेट करावी… ।…..

… आता… खाणा-याला पहिल्या घासातच जबरदस्त ठसका लागला तर समजावं.. मिशन फत्ते…”कुणीतरी आठवण काढली असेल.. “अशा फडतूस गोष्टींवर त्यांचा विश्वास बसू न देता…”मिसळ सही झाली य…” यावर पक्का विश्वास बसू द्यावा…. म्हणजे जमली तुमची झणझणीत मिसळ…!!!… लागलेला ठसका आवरता आवरता त्याला पुरेवाट झाली तरी आपण पुरे न करता उकळता रस्सा आणखीच घालीत जावे…म्हणजे प्लेटमध्ये हं…. जराही उसंत न घेऊ देता मिसळीचा समाचार घ्यावयास हवा.. न थांबता.. मिसळीसवे एकमत व्हावयास हवे…. फक्त मिसळीची वाफाळती डीश….. आणि ती वेडी तंद्री …. बस… जग इथेच सुरु होऊन इथेच संपावं……”Don’t disturb me…”अशी अलिखित सूचना आपल्या अंगप्रत्यांगातून प्रकट व्हावयास हवी…. गरम गरम रश्श्याने ओतप्रोत साकळलेला चमचा अंतर कापीत अधीर ओष्ठद्वयींपर्यंत येता येता, कुणी भोचकपणा करीत उगाचच अधेमधे काही विचारायला कडमडलंच…. तर तिकडे लक्षही न देता.. “ऊ.. हू हू हू…”असे काहीसे उद्गार काढून “नंतर बोल.. “सुचवावं…. जेणे करुन रसास्वाद घेण्याची समाधी भंग होणार नाही…… तेव्हा मिसळीस समाधान प्राप्त होतं…. खाणा-यासही… नि आपणासही…!!!

लेखिका : सौ. भारती भाईक

प्रस्तुती: सौ. मीनल केळकर

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ गळून पडलेली फुले… – लेखक : अज्ञात ☆ सौ. अंजली दिलीप गोखले ☆

सौ अंजली दिलीप गोखले

? इंद्रधनुष्य ?

☆ गळून पडलेली फुले… – लेखक : अज्ञात ☆ सौ. अंजली दिलीप गोखले

चालणे ही एक सामान्य क्रिया आहे पण चालण्याचं सौंदर्य हे आहे की आपल्या आजूबाजूला घडत असलेले जीवन पाहता येते.

मी रोज सकाळी फिरायला जातो तेव्हा मला एक वृद्ध गृहस्थ झाडाखाली पडलेली फुले उचलून मंदिरात दर्शनासाठी टोपलीत ठेवताना दिसतात.

त्यांचा हा उपक्रम माझ्यात कुतूहल निर्माण करत होता.

एका सकाळी, मी त्यांना पुन्हा तेच करताना पाहिले आणि मी माझी उत्सुकता शांत करण्याचा निर्णय घेतला.

मी त्यांना गळून पडलेल्या फुलांच्या ध्यासाबद्दल विचारले की इतर वृद्ध लोक तर ताजी फुले तोडतात.

मी त्यांना विचारले, “सर, मी तुम्हाला नेहमी जमिनीवरून ही ताजी पडलेली फुले उचलताना पाहतो.

तुम्ही त्यांचे काय करता? “

“मी ही फुले माझ्या पूजेच्या खोलीत देवतांच्या चरणी अर्पण करतो, ” त्यांनी अतिशय शांतपणे उत्तर दिले.

मी पहिल्यांदाच असं काही ऐकलं होतं.

म्हणून, मी त्यांना पुन्हा विचारले,

“तुमची काही हरकत नसेल, तर मी तुम्हाला विचारू का की, झाडावर सहज तोडता येणारी फुले असताना तूम्ही ही पडलेली फुले देवाला का अर्पण करता? “

त्यांच्या उत्तराने मी थक्क झालो, “मी फुलांना त्यांचा उद्देश पूर्ण करण्यास मदत करतो – त्यांच्या शेवटच्या दिवसात देवासोबत राहण्याचा!

त्यांनाही जीवन आहे; आमच्याप्रमाणे त्यांनाही त्यांच्या शेवटच्या दिवसात देवासोबत राहायचे आहे, नाही का? ” 

त्यांनी मला विचारले.

मी सहमती दर्शविली.

मग ते म्हणाले,

“काही लोक ज्या कळ्या अजून फुलल्या नाहीत अशा कळ्या खुडतात आणि काही फक्त नुकत्याच फुललेल्या कळ्या काढतात, त्यांना त्यांचा सुगंधही सोडू देत नाहीत किंवा त्यांचे जीवन जगू देत नाहीत.

प्रत्येकजण जे सुंदर आहे ते ओरबाडतो आणि त्यातून वनस्पतीचे सौंदर्य काढून घेतो.

मग पहा, ही झाडे कशी दिसतात – रंगहीन आणि निर्जन. “

ते पुढे म्हणाले, “प्रत्येक फुलाचा एक उद्देश असतो, देवासोबत राहण्याचा.

प्रत्येकजण झाडांवर असलेली फुले घेतो, पण मी ती निवडत नाही.

ती गळून पडणे हा फुलांचा दोष नाही.

या म्हातारपणात मी कुणालाही साथ देऊ शकत नाही, पण किमान या फुलांना त्यांचे ध्येय साध्य करण्यासाठी मदत करू शकतो. “

मी फक्त होकार दिला, हसलो त्यांना शुभेच्छा दिल्या आणि चालू लागलो.

मी चालत होतो तेव्हा माझे मन धावत होते.

या नव्या प्रेरणेने आणि कल्पनेने मी निश्चय केला की यापुढे पूजेसाठी फक्त पडलेली फुलेच गोळा करावयाची.

दुसऱ्या दिवशी सकाळी फिरण्यासाठी गेलो असता एका झाडाखाली पडलेली फुलं मी फुलं उचलून तळहातावर ठेवली. तळहातावर फुले ठेवताच, मला अंगावर रोमांच आले आणि माझे हृदय धडधडू लागले.

माझ्या शरीरासाठी या फुलांबद्दल मला वाटणारा तो एक वेगळाच अनुभव होता.

मी ती फुले घरी आणली, धुऊन ती कुठे असावीत तिथे म्हणजे परमेश्वराच्या चरणी ठेवली!

हा संपूर्ण अनुभव फक्त अप्रतिम होता.

मला आतून खूप छान वाटलं.

मला असे वाटले की मी कोणाचा तरी जीव वाचवला आहे किंवा एखाद्याला त्याच्या दुःखातून बाहेर येण्यास मदत केली आहे.

फुलांचे असे समाधान मला यापूर्वी कधीच जाणवले नव्हते आणि मला वाटते की मी असेच करत रहावं.

जे अकाली पडले आहेत त्यांना उचलून योग्य जागी ठेवा.

आयुष्यात आपल्याला नेहमी चांगल्या आणि सुंदर लोकांच्या आसपास राहायचे असते.

आपल्या उंचीच्या लोकांबरोबर आपल्याला स्वतःला पहायचे असते आणि जे आपल्या उंचीच्या खाली आहेत, त्यांना आपल्यापेक्षा खाली बघायचे असते.

पण खरे समाधान तेव्हा मिळते जेव्हा आपण एखाद्याला मदत करतो, त्यांचे जीवन चांगले बनवतो आणि त्यांना आनंद साजरा करण्यास मदत करतो – मग तो माणूस, प्राणी, पक्षी किंवा इतर कोणत्याही प्रकारचे जीवन असो. मग फुले का नाहीत?

*जे पडले आहेत, पदभ्रष्ट आहेत त्यांना उचला मार्गी लावा आणि पहा तुम्हाला स्वतःला उंचावल्यासारखे वाटेल. *

लेखक : अज्ञात 

© सौ. अंजली दिलीप गोखले 

मोबाईल नंबर 8482939011

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares