☆ ‘ताटासमोरची शांत कृतज्ञता…’ – लेखिका: श्रीमती शुभश्री ☆ प्रस्तुति – श्री मनोहर जांबोटकर ☆
☆
भारतीय संस्कृतीत जेवण म्हणजे केवळ पोट भरण्याचे साधन नसून तो एक संस्कार मानला जातो.
म्हणूनच जेवणापूर्वी “दासबोध”मध्ये श्री समर्थ रामदास स्वामींनी लिहिलेला खालील श्लोक म्हटला जातो.
“वदनी कवळ घेता नाम घ्या श्रीहरीचे।
सहज हवन होते नाम घेता फुकाचे ॥
जीवन करी जीवित्वा अन्न हे पूर्णब्रम्ह ।
उदरभरण नोहे जाणिजे यज्ञकर्म ॥”
या काही ओळींमध्ये केवळ देवाचे स्मरण नसते. तर अन्नासाठी, त्यामागील श्रमासाठी आणि मिळालेल्या समाधानासाठी कृतज्ञता दडलेली असते. मग असे अन्न खाताना अहंकार भाव नसतो. कारण ते आपल्या कष्टाचे असले तरी ते ईश्वरकृपेने मिळालेले असते. त्यात ईश्वराचा वास व देवपूजेसारखे पुण्यकर्म असते. असे श्रद्धेने,योग्य भावनेने केलेले जेवण म्हणजेच यज्ञ होय.
अशी प्रार्थना करण्याची आपली परंपरा आहे.मात्र आजच्या धावपळीच्या जीवनात आणि मोबाईलमध्ये गुंतलेल्या आयुष्यात ही प्रार्थना हळूहळू विस्मरणात जात आहे.
परदेशात राहत असताना, एके दिवशी अगदी सहजपणे माझ्या नजरेत एक साधंसं दृश्य आलं. आणि माझ्या मनात ते खोलवर रुतून बसलं. माझी कामवाली (मेड) जेवणाच्या प्लेटसमोर बसली होती. तिचे डोळे मिटले होते. आणि ती ओठाने हलकेच पुटपुटत होती. सभोवतालच्या गडबडीतही तिच्याभोवती शांततेचं एक वलय होतं.
जेवणानंतर मी तिला विचारलं. तेव्हा ती सहजपणे म्हणाली, “Madam, We are praying for and believing in one God in heaven “ (“मी प्रार्थना करत होती.”)
मला थोडं आश्चर्यच वाटलं. पुढे ती म्हणाली की, त्यांच्या संस्कृतीत जेवणापूर्वी देवाचे आभार मानण्याची पद्धत आहे. अर्थात,तिने ती प्रार्थना तिच्या स्थानिक भाषेत केली होती. पण नंतर तिने मला तिचा अर्थ इंग्रजीत सांगितला. खरेतर तिच्या प्रार्थनेचे शब्द साधे पण अर्थ विलक्षण खोल विचार करायला लावणारा होता. ती म्हणाली, “आम्ही अगोदर देवाचे आभार मानतो. कारण त्याच्या कृपेने मला आज हे अन्न मिळाले. आणि त्याच्याच बरोबर तुमचेही आभार मानतो. कारण तुम्ही ते मला दिले. त्यामुळेच मी आज तृप्तपणे खाऊ शकते आहे.आणि त्यासाठी तुम्हाला सदैव सुख शांती लाभो, अशीही मी देवाकडे प्रार्थना करते. थोडक्यात काय, ‘अन्न दाता सुखी भव।’”
म्हणजेच प्रार्थना शब्दात नसते.
ती भावनेत असते. ती देवळात नाही तर ताटासमोरही करायची असते.
आणि त्याच क्षणी मला प्रकर्षाने जाणवलं, प्रार्थना ही भाषा, देश किंवा संस्कृतीत अडकलेली नसते. आपल्यापेक्षा वेगळ्या देशात, वेगळ्या संस्कृतीतील एक साधी स्त्री अन्नाप्रती इतकी कृतज्ञता व्यक्त करते,की जी कृतज्ञता आपण विसरत चाललो आहोत. तीच कृतज्ञता एका परक्या देशात अजूनही श्वास घेताना पाहत होते.
कदाचित पुन्हा एकदा आपल्याला हे असंच जेवणापूर्वी थोडं थांबायला हवं. ताटाकडे पाहून क्षणभर डोळे मिटून शब्दाशिवाय “धन्यवाद” म्हणायला हवेत. कारण ‘अन्न पोट भरतं.’
पण ‘कृतज्ञता माणूसपण जिवंत ठेवते.’
*
लेखिका: श्रीमती शुभश्री
प्रस्तुती :श्री मनोहर जांबोटकर
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
☆ “रु. १०० ची ‘ती’ नोट आणि बीएमडब्ल्यूची चावी” – लेखक : डॉ. सुजित भरत पाटील ☆ प्रस्तुती – सौ. शशी नाडकर्णी-नाईक☆
☆
रात्रीचे साडेअकरा.
शटर अर्ध्यावर खाली खेचलं होतं. डोळे जड झाले होते आणि दिवसभर पेशंट्स पाहून डोकं जड झालं होतं.
तितक्यात दारात एक सावली दिसली.
कपड्यांवरूनच ओळखू येत होतं—दिवसभर सिमेंट-विटा उचलून आलेला एक बांधकाम मजूर. अंगावरचा शर्ट घामाने चिकटलेला आणि पायातल्या चपलांना सिमेंटचा थर.
त्याच्या कडेवर दीड वर्षाचं पोरगं होतं, जे तापाने फणफणलं होतं.
तो आत आला, पण दारातच थबकला.
त्याची नजर माझ्या केबिनच्या चकाचक टाईल्सवर आणि काचेवर गेली. त्याने संकोचाने स्वतःच्या मळक्या चपला बाहेरच काढल्या आणि अनवाणी पायाने, कोपऱ्यात येऊन उभा राहिला.
त्याच्या मनातली ती भीती मला स्पष्ट दिसत होती, “आपल्यामुळे डॉक्टर साहेबांची केबिन खराब होईल का? “
मी खुणेनेच त्याला बोलावून घेतलं.
बाळाला तपासलं. छाती भरली होती. नशीब, वेळेवर आला होता म्हणून न्यूमोनियाचा धोका टळला होता.
मी औषधं लिहून दिली आणि पाठीवर हात फिरवून सांगितलं, “काळजी नको करू. वाघ आहे तुझा पोरगा. दोन दिवसात ठणठणीत होईल! “
त्याच्या चेहऱ्यावरचा जीवघेणा तणाव निवळला. त्याला वाटलं होतं, डॉक्टर ॲडमिट व्हायला सांगतील, हजारो रुपये लागतील.
त्याने थरथरत्या हाताने खिशातून एक प्लॅस्टिकची पिशवी काढली.
त्यातून जेमतेम एक १०० ची नोट बाहेर आली. घामाने ओलसर झालेली, मळकटलेली आणि शंभरदा हाताळल्यामुळे जीर्ण झालेली ती नोट.
फी पूर्ण भरत नव्हती.
त्याचा चेहरा पुन्हा पडला. ती हतबलता मला बघवली नाही.
मी त्याचा हात पकडला आणि नोट परत करत म्हटलं,
“अरे राहू दे बाबा. फी नको. तू फक्त बाळाला औषधं घे आणि चांगलं खायला घाल. “
त्यावर तो मजूर जे बोलला, त्याने माझ्या अंगावर काटा आला.
तो करारी आवाजात म्हणाला,
“नको साहेब. ही तुमची ‘विद्या’ हाय, आणि हे माझं कष्टाचं ‘दाम’ हाय. फुकट इलाज केला तर माझ्या लेकाला गुण नाही येणार. हे पैसे ठेवा, बाकीचे उद्या कामावरून सुटल्यावर आणून देतो. “
त्याने ती ‘चूरगळलेली शंभरची नोट’ माझ्या टेबलावरच्या पेपरवेटखाली दाबून ठेवली, हात जोडले आणि निघून गेला.
तो गेला… पण मला रात्रभर झोप लागली नाही.
सकाळीच माझ्याकडे एक सुटाबुटातले ‘सुशिक्षित’ गृहस्थ आले होते. ३०० रुपये फीसाठी त्यांनी रिसेप्शनवर १० मिनिटं हुज्जत घातली होती, “आम्ही जुने पेशंट आहोत, काहीतरी डिस्काऊंट द्यायला पाहिजे! “
जाताना त्यांनी खिशात आयफोन ठेवत, बीएमडब्ल्यूची (BMW) चावी फिरवत मला ‘बाय’ केलं होतं.
आणि इकडे हा मजूर?
ज्याला उद्याच्या जेवणाची भ्रांत आहे, पण “डॉक्टरांच्या विद्येचा अपमान होऊ नये, ” म्हणून तो आपला घामाचा पैसा हक्काने देऊन गेला.
त्याला सवलत नको होती, त्याला ‘गुण’ हवा होता.
त्या रात्री मला समजलं…
खरी श्रीमंती तुमच्या बँक बॅलन्समध्ये किंवा गाडीच्या ब्रँडमध्ये नसते,
ती तुमच्या ‘संस्कारांत’ असते.
त्या बापाने दिलेली ती ‘चूरगळलेली नोट’ माझ्यासाठी आजवरची सर्वात मोठी फी होती. कारण ते केवळ एक चलन नव्हतं, तर तो एका स्वाभिमानी बापाचा ‘आशीर्वाद’ होता.
☆
लेखक : डॉ. सुजित भरत पाटील
प्रस्तुती : सौ. शशी नाडकर्णी-नाईक
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
☆ चुलीभोवती साकारलेले भाषिक ‘ऐश्वर्य’… – लेखक: डॉ. केशव स. देशमुख ☆ प्रस्तुती – श्री सुहास रघुनाथ पंडित☆
☆
बोली काय अथवा भाषा काय, ती एकठायी अशी नसते. तिच्या उगमाचं अचूक स्थान सांगता येत नाही. तथापि, अनुमानानं भाषेचा शोध नोंदवता येतो. तशा नोंदी अनेक चिंतकांनी मांडून भाषेच्या वाटा दाखवलेल्या आहेत. पण हे अंतिम सत्य नव्हे. हा सत्याच्या दिशांचा शोध होय, असे खात्रीने सांगता येते.
चूल आणि भाषा यातील भाषिक नजाकत किंवा बोलीची आशयघनता असलेले शब्दधन मराठीच्या शब्दसंस्कृतीला मिळालेले वरदानच! खेडी आज पुष्कळशी बदललेली असली तरी *अन्न हे पूर्णब्रह्म* हे वचन अंगीकारत उदरभरणाचे खेड्याचे प्रधानस्थळ *चूल* तर आजही आहेच. हा चुलीचा परिसर भाषिक ऐश्वर्याचा एक असाधारण दाखलाच. चूल म्हटले की, महिला, श्रम, सैपाक, साधने, नावे आणि भाषा असा एक एकोपा कालानुकाल असलेला.
आज यात परिवर्तन जाणवत असले तरीही *घरोघरी मातीच्या चुली* आणि या अशा चुलीभोवती असलेले भाषिक ऐश्वर्य आमच्या मराठीची अभिजात शानच अधोरेखित करणारे आहे.
या गावसंस्कृतीचे उदरभरण करणा-या या चुलीभोवती मराठी बोलीतील शब्दधन काठोकाठ भरलेले आढळून येते. ही मराठी भाषिक वैभवाची समृद्ध अशी बाब म्हणायला हवी. खेड्यातील चुलीचा हा अवाढव्य आणि महत्त्वाचा परिसर चुलीशी जूडून असलेले भाषिक वैभवच दाखविणारा आहे. ग्राम, प्रदेश, संस्कृती, बोली, शब्द-धन, श्रम आणि महिला यांच्या एकसामायिक संघटनामधून आलेले हे भाषिक वैभव फारच मोलाचे आणि भाषिक उपकृततेच्या दृष्टीने उल्लेखनीय आहे.
चूल परिसरातील बोलीभाषेचे वैभव सोदाहरण पाहूया. कंसात त्या त्या शब्दांचा साररूप अर्थ दिला आहे. जसे की, *सनकाडी* (चूल पेटविण्यास लागणारी शीघ्र ज्वलनशील अशी वाळलेली अंबाडीची काडी), *हुडवा* (शेणाच्या वाळलेल्या गोव-या सांभाळून ठेवण्यासाठी हवाबंद केलेला ढीग, साठवण), *ढेपसा* (विझून शांत झालेली गोवरीची राख, जी खेड्यात आजही अनेकदा दात निर्मळ करावयास दंतमंजनासारखी वापरली जाते), *वतोल* (अंघोळीसाठी पाणी गरम करण्यासाठी न्हाणीघरात असलेला भलामोठा चुल्हा, जणू चुलीचा थोरला भाऊच), *आहार* (चुलीतला धगधगता लालबुंद निखारा), *इसान* (खूप गरम पाण्यात थंड पाणी मिसळून अंघोळीस अनुरूप करावयाची पाण्याची स्थिती), *जळतन* (वाळलेला लाकूडफाटा, केरकचरा जो चूल पेटविण्यास हवा असतो तो) चूल प्रज्वलीत करण्यासाठी ही सगळी साधनसामुग्री आणि त्याभोवती असलेले हे असे मोलाचे भाषिक-धन मराठीत सलग एकाठायी आलेले आढळत नाही.
गाव-चुलीवर केवळ सैपाक होत नाही, तर तिथे साधनभाषा आणि अनोखी शब्दसंपदाही नांदत असते. आता हे पहा, *काठोट* (भाकरीचे पीठ मळण्यासाठी दोन कान असलेली लाकडाची मोठी परात किंवा पराता), *बेलने* (गव्हाची पोळी लाटण्यासाठी दोन हातांनी पोळी करावयाचा रूळ), *बुडगे* (पितळी लहान पेला), *येळनी* (खापराची मोठी वाटी किंवा वाटा), ही गावचुलीची भाषा. तव्यावरची भाकरी परतवण्यासाठी ही भाषा उलथण्याला *सराटा* म्हणते. पाणी ठेवण्याच्या खापरी भांड्यांना ही गाव-माणसं *माथन, केळी, बिनगी* अशा अनेक नावांनी या भांड्यांची ओळख करून देतात.
गावी किंवा वावरात जाताना भाकर-चटणी ठेवायला येथे टिफीन नसतो. तिथे असतो *पालव* (कापडाचा जुना तुकडा) बाजारात जाताना सॅक, पिशवी कुठली? इथे तो असतो *झो-या* किंवा *खलत्या. * गावी, गरीबाघरी संसारात धातूची भांडी ती कुठली! मातीचा, खापराचा, गरीबीची संसार हीदेखील गावाची भाषिक, सामाजिक अभिजात अशीच ओळख पूर्वापारची. इथला सगळा संसार गाडगी-मडकी यांचाच. जिन्नस ठेवायला इथे असते *उतरंड. * म्हणजे खापरी भांड्यांच्या आतल्या घरातल्या रांगा किंवा चळती. या मडक्यांनाही येथील भाषेत अनेक नवी नावे असतात. *गाडगं, मडकं, खापरी, सुगडे, डेरा* इत्यादी. सारांश काय तर स्थळ, घटना, प्रसंग बदलला की, या खापराच्या वस्तू नवा शब्दांचा पेहराव करून वावरतात हे खास वैशिष्ट्य! चुलीचाच हा भवताल, भाषेचा नवा आयाम दाखविणारा!
शिवाय, चुली म्हटले की, जिभेच्या चवीचा चवदार तृप्तीचाही नजराणाच. या चुलीवर रटरटणाऱ्या किती तरी पदार्थांना एक हटके चव आहे आणि भाषेचीही त्यांना अवीट गोडी आहे. उदा. पुरणाची पोळी बुडवून खाण्यासाठी एक पातळ गोडसर पदार्थ बनवतात ते असते *आळण. * सगळी धान्य एकत्रित करून अशा पिठांच्या बनवलेल्या पौष्टिक भाकरीला म्हणायचे *बेलडीची भाकर. * हीच भाकर खान्देशात *कयन्याची भाकर* असते. हिरव्या हरभऱ्याची कोवळी पाने कुटून त्यात चटणीमीठ घालून जो तयार होतो तो असतो *घोळाणा. * जगातल्या कुठल्याही सॅलडला पराभूत करेल एवढा अस्सल हा पदार्थ. घोळाणाचे भाषांतरही अशक्य असा चवदार हा पदार्थ. नाव, भाषा, शब्दही लज्जतदार!
गावभाषेतील चूलपरंपरेत वसून असलेल्या शब्दांना त्यांचा स्वतःचा नाद आहे आणि भाषा म्हणूनही खास अशी खुमारीही आहे. *वळवट, सरगुंडे, बोटवे* हे येथील महिलांनी अपार कष्ट करून बनवलेले भातांचे प्रकार आहेत. नूडल्सची ही आदिम रूपे आहेत. पण नूडल्सला मागे टाकणारी. गव्हाचा मूळ स्रोत वापरून *वळवट, बोटवे* केले जातात. साखर, दूध, तूप घालून खाल्ला जाणारे हे मुलायम स्निग्ध पदार्थ मूलतः सणासुदीला खाण्यात येतात. अळूची पाने इथे *चमकुरा* होऊन आलेली असतात. फळभाज्या उन्हात वाळवून ठेवतात. त्यांना *उस-या* म्हटले जाते. तसेच गूळ आणि पीठ घालून जेवणात गोड बनवलेला पातळसा पदार्थ खेडूतांच्या ताटात येतो तो *लाभडे* होऊन. हे धन जतन करायला हवे.
चूल ही आहार आणि आरोग्याचीही अन्नपूर्णाच. गावाची भाषा चुलीने अधिक रसदार आणि लयदार ठेवली यात काहीच शंका नाही. अशा एकेका स्थळाचा भाषिक महिमा सांगणारे अन्नपूर्णेचे नवे कोश सचित्र, साधार सिद्ध करण्याची आवश्यकता आहे. हे तगडे परंतु सर्वेक्षणाचे, कष्टाचे काम आहे. हे घडले नाही तर एक मोठा ग्रामस्तरीय शब्दऐवज आपण गमावून बसू. मग आपल्याहाती उरेल ती फक्त रूखरूख! या अशा संपन्न गावरहाटीत रोज ताटात येणाऱ्या भाज्यांची नाम-भाषाही नूतन, वेगळी, रसरशीतच आहे! जसे की, कोथिंबीरऐवजी संबार, बटाटेऐवजी आल्लू, ढेमशाऐवजी दिलपसंद, छोट्या काकड्याऐवजी शैलन्या किंवा शेन्ना, भली मोठी काकडी याऐवजी वाळकं, भेंडी असं म्हणण्याऐवजी बोंडं किंवा भेंडरं म्हणणं. वांग्यांची गावाकडे बैंगनं झालेली असतात.
ज्या त्या फळ आणि भाज्यांना मातीतल्या सुवासाला धरून नावे देण्याची गावभाषेची ही रीत मराठी बोलीभाषेची चव आणि या बोलीची खचितच श्रीमंती वाढविणारी आहे. मुख्यत्वे ही सारीच्या सारी बोलीप्रवण शब्दसंपदा मातीचा आणि येथील समग्र समाजजीवनाचा भाषिक, सामाजिक, सांस्कृतिक, कालिक आणि महिलांच्या श्रमनिष्ठेचा अमोल ठेवाच! कुठलीची भाषा एकल नसते. एकट्याची नसते. भाषेचे पाझर दूर आणि खोलवर वाहाते राहिलेले असतात आणि ते समाजाच्या चलनवलनातून अखंडित राहिलेले असतात. समाज आटला की भाषा आटते. हे एवढे भाषिक मौलिकत्व जतन करण्याची जबाबदारी गावमाणसांसह जशी गावाची आहे तशी ती आपल्यातल्या प्रत्येकाचीही आहेच!
☆
लेखक :डॉ. केशव स. देशमुख
प्रस्तुती : श्री सुहास रघुनाथ पंडित
सांगली (महाराष्ट्र)
मो – 9421225491
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
☆ “जेव्हा स्वयंपाकघर शांत झालं…” – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – श्री मोहन निमोणकर ☆
★★★
– अमेरिकेची खरी कहाणी.
कधी विचार केला आहे का…
की एका शांत झालेल्या स्वयंपाकघराने संपूर्ण देशाचं भविष्य बदलू शकतं?
अमेरिकेत तसं घडलं.
1970 च्या दशकात बहुतेक घरांत आई-वडील, मुलं, आजी-आजोबा एकत्र राहायचे. संध्याकाळी सगळे डायनिंग टेबलावर बसायचे. घरातली पोळी, ब्रेड, सूप, पाय (pie) फक्त पोट भरत नव्हते, तर त्यांच्यातील नातीही घट्ट करत होते.
पण 1980 नंतर हळूहळू दृश्य बदललं.
फास्ट-फूड, टेक_अवे, रेस्टॉरंट यांनी त्यांच्या स्वयंपाकघरावर ताबा मिळवला. आई-वडील कामात व्यस्त झाले, मुलं पिझ्झा-बर्गरमध्ये रमली, आणि आजोबांचा आवाज कमी झाला.
त्याच वेळी काही तज्ज्ञांनी चेतावणी दिली होती –
“जर तुमच्या घरातील जेवणाचं नियंत्रण कंपन्यांकडे गेलं, आणि मुलं-वृद्धांची जबाबदारी सरकारवर टाकली, तर कुटुंबे उद्ध्वस्त होतील. ”
लोकांनी त्याकडे दुर्लक्ष केलं आणि
खरंच तसंच झालं.
1971 मध्ये अमेरिकेत 71% कुटुंबं “पारंपरिक” होती – आई, वडील आणि मुलं एकत्र. आज ती संख्या फक्त 20% आहे.
उरलेलं काय? – वृद्धाश्रमात गेलेले आजोबा-आजी, भाड्याच्या अपार्टमेंटमध्ये एकटं जगणारे तरुण, तुटलेली लग्नं, एकाकी पडलेली मुलं. घटस्फोटाचं प्रमाण पहिल्या लग्नात 50%, दुसऱ्यात 67% आणि तिसऱ्यात तब्बल 74%!
अमेरिकेतील हा अपघात नाही. ही किंमत आहे – शांत झालेल्या स्वयंपाकघराची आणि त्याकडे दुर्लक्ष करणाऱ्या समाजाची!!
कारण घरचं जेवण हे फक्त अन्न नाही.
ते ऊब आहे.
ते आईच्या हाताचा स्पर्श आहे.
ते दादांच्या गप्पा आहेत.
ते आजीच्या गोष्टी आहेत.
ते घराला “कुटुंब” बनवणारी जादू आहे.
पण आज जेवण स्विगी, झोमॅटो वरून येतं, आणि घर हळूहळू “गेस्टहाऊस” बनतं.
याचं दुसरं भयंकर रूप म्हणजे बिघडणारे आरोग्य!
फास्ट-फूडच्या व्यसनामुळे अमेरिकेत स्थूलता, मधुमेह, हृदयरोग एवढ्या वेगाने वाढले की आज संपूर्ण आरोग्य उद्योग “आजारी पिढ्या”वर नफा कमावतो.
पण अजून वेळ गेलेली नाही.
स्वयंपाकघर पुन्हा पेटवायला हवं.
जगातल्या अनेक संस्कृतींनी हे सिद्ध केलंय.
जपानी अजूनही एकत्र स्वयंपाक करतात, जेवतात, म्हणून ते दीर्घायुषी आहेत.
भूमध्य समुद्रातील लोक जेवणाला पवित्र मानतात, म्हणून त्यांची नाती मजबूत आहेत.
*अमेरिकेची ही कहाणी आपल्याला सावध करण्यासाठी आहे!! *
आज भारतातही बाहेरचं खाणं, फूड-डिलिव्हरी, व्यस्त जीवन — सगळं तसंच सुरू आहे.
उद्या आपल्या घरातही स्वयंपाकघर शांत होऊ नये, म्हणून…
चूल पुन्हा पेटवा. जेवण बनवा. कुटुंबाला टेबलावर आणा; कारण शयनकक्ष घर देतो, पण स्वयंपाकघर कुटुंब घडवतं.
*आपल्या घराला कुटुंब बनवायचे आहे की, गेस्ट हाऊस हे ठरवा!! *
*अमेरिकेस ठेच लागली आहे, भारतीय कधी शहाणे होतील?? *
★★★
लेखक : अज्ञात
प्रस्तुती : श्री मोहन निमोणकर
संपर्क – सिंहगडरोड, पुणे-५१ मो. ८४४६३९५७१३.
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
☆ नवीन वर्ष म्हणजे… – लेखक: अज्ञात ☆ प्रस्तुती – श्री सुहास रघुनाथ पंडित☆
☆
नवीन वर्ष म्हणजे – –
खरं पाहिलं तर नवीन वर्ष म्हणजे काही भौतिक बदल नाही. सूर्य तोच असतो, आकाश तेच असतं, आपल्या जबाबदाऱ्या, अपयश, स्वप्नं सगळं कालचं असतं. फक्त कॅलेंडरवरची एक तारीख बदलते. तरीही या बदलाला माणूस इतकं महत्त्व का देतो, याचा विचार केला तर एक महत्त्वाची गोष्ट लक्षात येते. माणूस तारखांपेक्षा भावनांवर जगतो.
आपण आयुष्यात अनेकदा थकतो. एखादा दिवस वाया गेला की, मनात अपराधभाव येतो. एखादं अपयश बोचत राहतं. पण त्या थकलेल्या मनालाही स्वतःला सावरण्यासाठी एखादा टप्पा, एखादी रेषा हवी असते. नवीन वर्ष ही अशीच एक मानसिक रेषा असते. इथपर्यंत झालं, आता पुढे नव्याने प्रयत्न करू.
खरं तर नवीन सुरुवात करण्यासाठी 1 जानेवारीची गरज नसते. पण तरीही हा दिवस वेगळा वाटतो, कारण तो आपल्या मनाला परवानगी देतो. मागचं ओझं थोडं बाजूला ठेवून पुढे पाहण्याची. सोमवारी, महिन्याच्या पहिल्या दिवशी, किंवा नवीन वर्षाच्या सुरुवातीला आपल्याला जो उत्साह जाणवतो, तो बदलामुळे नाही; तो आशेमुळे असतो.
नवीन वर्ष म्हणजे संकल्पांची यादी नाही. ती पूर्ण झाली नाही म्हणून स्वतःला दोष देण्याचाही तो दिवस नाही. नवीन वर्ष म्हणजे स्वतःशी शांतपणे केलेली एक कबुली मी अजूनही बदलू शकतो. अजूनही शिकू शकतो. अजूनही स्वतःपेक्षा थोडा चांगला होऊ शकतो.
वर्ष बदलतं तेव्हा आयुष्य बदलत नाही, पण आयुष्य बदलण्याची तयारी मात्र मनात जन्म घेते. हीच तयारी महत्त्वाची आहे. कारण माणसाला पुढे नेणारी गोष्ट तारीख नाही, तर नव्या शक्यतेवरचा विश्वास आहे.
येतं वर्ष हे केवळ शुभेच्छांचा औपचारिक सोहळा न राहता, थोडं अधिक प्रामाणिक, थोडं अधिक जागरूक आणि थोडंसं स्वतःकडे वळलेलं ठरो. कालच्या चुका आपल्याला तोडू नयेत, तर घडवाव्यात एवढीच अपेक्षा.
नवीन वर्ष आपल्याला नवा माणूस बनवो, असं नाही;
पण आपल्यातला खरा माणूस अधिक ठळकपणे समोर आणो.
याच भावनेतून नवीन वर्षाच्या मनापासून शुभेच्छा.
नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!
☆
लेखक : अज्ञात
प्रस्तुती : श्री सुहास रघुनाथ पंडित
सांगली (महाराष्ट्र)
मो – 9421225491
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈