मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ वेळीच दाद द्या ☆ डॉ. ज्योती गोडबोले

डॉ. ज्योती गोडबोले

? मनमंजुषेतून ?

☆ वेळीच दाद द्या ☆ डॉ. ज्योती गोडबोले ☆ 

(व्हाट्सअपवरून आलेल्या एका अतिशय चांगल्या मेसेजवरून सहज सुचलेलं.)

—–माणूस जिवंत असतानाच आपण त्याला का चांगले म्हणत नाही ?  दुर्दैवाने तो गेल्यावर, मग त्याचे चांगले गुण आपण गौरव करून सांगतो. आपले एवढे मोठे  मन  का बरं नसावं, की आपण एखाद्याला त्याच्यासमोरच कौतुकाचे शब्द ऐकवावे.

—–विशेषे करून आपण बायका,समोरच्या बाईंचे कौतुक जरा हात राखूनच करतो ना?

काय हरकत आहे हो लगेच असं म्हणायला , की  “ अग, किती सुंदर आहे ही तुझी साडी,

अगदी मस्त दिसतेय तुला.” 

—–का नाही पटकन आपण म्हणत,  “  किती ग मस्त केलेस तू वडे. अगदी अन्नपूर्णा आहेस बघ. “ 

—–पण सहसा हे लोकांच्या हातून होत नाही.—हे फक्त बायकांच्याच बाबतीत नाही मला म्हणायचे, तर पुरुष मंडळीही याला अपवाद नाहीत. ऑफिसमध्ये, कनिष्ठ पदावरच्या  माणसाला  प्रमोशन मिळालं , तर खुल्या दिलाने त्याचे कौतुक किती सहकारी करत असतील? फार कमीच.

—–ही वृत्ती लहान मुलांतही असतेच. पण पालकांनी त्याला खतपाणी घालता कामा नये. पहिल्या आलेल्या मुलाचे खुल्या दिलाने अभिनंदन करायला मुलांना आईवडिलांनी शिकवले पाहिजे.

 —– सुंदर दिसणाऱ्या मुलीचे आपण कित्तीतरी वेळा मनातल्या मनात कौतुक करतो. 

पण मग तिला तसे प्रत्यक्ष जाऊन सांगत का नाही ?–की, “ अग, किती छान दिसतेस तू.

तुझा चॉईस खूप छान आहे, तुला  कपड्यातले खूप छान कळते ग. माझ्या बरोबर येशील का खरेदीला? “ —बघा किती आनंद होईल तिला.

—–सुनेने एखादा पदार्थ खरोखरच सुंदर केला, तर द्यावी ना सासूबाईंनी दाद की “ किती चव आहे ग तुझ्या  हाताला. मस्त केलेस हो हे. ”

—–आनंद, हा कौतुक केल्याने  द्विगुणित होतो— आम्ही पुण्याच्या प्रख्यात हुजूरपागा शाळेत  शिकलो. मुख्याध्यापक बाईंच्या त्या ऑफिसमध्ये जायचीही भीती वाटायची तेव्हा, इतका त्या खुर्चीचा दरारा होता. पुढे फार वर्षांनी माझी मामेबहीण  हुजूरपागेची मुख्याध्यापिका  झाली. इतके कौतुक वाटले ना तिचे. तिला भेटायला आणि तिचे कौतुक करायला, तिला न कळवता आम्ही बहिणी शाळेच्या ऑफिसमध्ये गेलो. म्हटले, “ आमची बहीण कशी दिसते या खुर्चीत, ते बघायला आलोय आम्ही .”  त्यावेळी तिचे आनंदाने भरून आलेले डोळे आजही आठवतात.

—–पाठीवर दिलेली कौतुकाची थाप तर आपल्या कुत्र्यालाही आवडते. मग आपण तर माणसे—का नाही समोरच्याचे वेळीच कौतुक करू? चार चांगले शब्द काय जड होतात का हो उच्चारायला?

—–या वरून आपल्या लाडक्या सुधा मूर्ती आठवतात.–तळागाळातील बायकांशी मैत्री करून, त्यांची सुखदुःख्खे जाणून घेऊन, त्यावर उपाय शोधून, पुन्हा कुठेही मोठेपणाची हाव न धरणाऱ्या सुधाताईंचे किती कौतुक करावे—-समाजाने वाळीत टाकलेल्या बायकांनी केलेल्या सुबक गोधड्या बघून, त्यांचे मन भरून कौतुक करणाऱ्या सुधाताई नुसत्या तेवढ्यावरच थांबल्या नाहीत, तर त्यांना त्या विकायला त्यांनी बाजारपेठ उपलब्ध करून दिली. ,मान खाली घालायला लावणारा त्यांचा व्यवसाय त्यांना सोडायला लावून, नवीन दिशा दिली. आणि यातूनच, “ तीन हजार टाके ” हे त्यांचे प्रसिद्ध पुस्तक जन्माला आले.—–असे निरपेक्ष मोठे मन  आपण किती लोकांकडे बघतो?  फारच कमी. खरं  तर आपल्या स्वतःपासूनच सुरुवात करत, आपणही खुल्या दिलाने इतरांचे कौतुक करायला शिकले पाहिजे.

—–मी मुलीकडे हॉंगकॉंग ला गेले होते. तिकडे फिरत असताना , आम्हाला बाबा गाडीत आरामात बसलेली  दोन इतकी गोड बाळे दिसली ना—–मला लहान मुले अतिशय आवडतात. त्यातून ही गुबगुबीत आणि गोंडस जुळी मुले तर मिचमिचे डोळे करून आमच्याकडे बघत होती. मी त्यांच्या आईला विचारले, “ मी बोलू का यांच्याशी? ” ती हसली आणि म्हणाली,” हो, बोला की. पण ती चावतात बर का. जपूनच बोला. ” मी गुढग्यावर बसले, आणि चक्क मराठीत बोलू लागले त्या गोड बाळांशी. ती दोघेही जोरजोरात दंगा करायला लागली, आणि हात पसरून माझ्याकडे झेप घेऊ लागली. त्यांच्या आईला खूप मजा वाटली. किती अभिमानाने ती आपल्या गोड बाळांकडे बघत होती —–

—–प्रेमाला भाषा नसते हो—फक्त तुम्ही ते व्यक्त करा, ते समोर पोचते लगेच.

—– माणूस जिवंत असतानाच दाद द्या,

—–चार शब्द कौतुकाचे बोला,

—–तो माणूस शहरातून बदलून गेल्यावर, किंवा दुर्दैवाने या जगातूनच निघून गेल्यावर, मग हळहळून काय उपयोग ?

—–आपल्या भावना लगेचच पोचवायला शिका.  वेळ आणि वाट नका बघत बसू. 

 कारण नंतर कितीही हळहळूनही , गेलेली वेळ परत येत नसते. मग आपल्या हातात, 

“ अरेरे।” असं म्हणत पश्चात्ताप करण्याशिवाय काहीही उरत नाही.

—–मंडळी चला तर मग —करा सुरुवात दिलखुलास दाद द्यायला,—न कचरता.

आणि बघा,  समोरचाही किती खुश होतो,  आणि तुमचाही दिवस किती सुंदर जातो ते।।।

© डॉ. ज्योती गोडबोले 

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ नेहमी स्वयंपाकघरात पिठाची पिशवी ठेवा ☆ संग्रहिका – सुश्री मीनल केळकर

? इंद्रधनुष्य ? 

☆ नेहमी स्वयंपाकघरात पिठाची पिशवी ठेवा ☆ संग्रहिका  – सुश्री मीनल केळकर ☆ 

नेहमी स्वयंपाकघरात पिठाची पिशवी (अट्टा) ठेवा आणि ती कुठे आहे हे सर्वांना कळवा.

(कृपया शेवटपर्यंत वाचल्याशिवाय हटवू नका)

“हा स्वतः भाजलेल्या स्त्रीचा खरा जीवन अनुभव आहे …”.——

काही वेळापूर्वी, मी कॉर्न उकळत होतो आणि कॉर्न तयार आहे की नाही हे पाहण्यासाठी उकळत्या पाण्यात थोडे थंड पाणी ओतले.  चुकून मी माझा हात उकळत्या पाण्यात बुडवला …. 

माझा एक मित्र जो व्हिएतनामी पशुवैद्यकीय डॉक्टर होता घरी आला होता.  म्हणून मी वेदनेने ओरडत असताना त्याने मला विचारले की माझ्याकडे घरी (गव्हाच्या) पिठाची  पिशवी आहे का?

मी थोडे पीठ ओतले  आणि त्याने माझा हात पिठात टाकला आणि मला सुमारे 10 मिनिटे थांबायला सांगितले.

त्याने मला सांगितले की व्हिएतनाम मध्ये एक मुलगा होता जो एकदा जळला होता.  त्याच्यावर आग लागल्याने आणि घाबरून कोणीतरी आग विझवण्याचा प्रयत्न करण्यासाठी त्याच्या संपूर्ण शरीरावर पिठाची पोती ओतली.  पण केवळ जाळच विझवला गेला नाही तर मुलावर भाजल्याचा कोणताही मागमूस नव्हता !!!!

माझ्या स्वतःच्या बाबतीत, मी माझा हात पिठाच्या पिशवीत 10 मिनिटांसाठी ठेवला आणि नंतर काढला आणि त्यानंतर मला जळण्याच्या कोणत्याही लाल खुणाही दिसल्या नाहीत.  शिवाय, पूर्णपणे वेदना नाही.

आज मी पिठाची पिशवी फ्रिजमध्ये ठेवली आणि प्रत्येक वेळी मी भाजल्यावर पीठ वापरते.  वास्तविक थंड पीठ खोलीच्या तपमानापेक्षा खूप चांगले आहे.

मी पीठ वापरते आणि मला कधी भाजल्याचा मागमूसही नाही!

एकदा माझी जीभ पोळली होती आणि त्यावर सुमारे 10 मिनिटे पीठ ठेवले होते …. वेदना थांबल्या.

त्यामुळे नेहमी तुमच्या रेफ्रिजरेटरमध्ये कमीत कमी पिठाचे पिशवी ठेवा.

????✌️

पीठात उष्णता शोषण्याची क्षमता असते आणि त्यात मजबूत अँटिऑक्सिडेंट गुणधर्म असतात.  अशा प्रकारे, जळलेल्या रुग्णाला 15 मिनिटांच्या आत लागू केल्यास ते मदत करते.

जेव्हा एखादी व्यक्ती आपल्यासाठी फायदेशीर अशी एखादी गोष्ट शेअर करते, तेव्हा ती इतरांबरोबर शेअर करण्याची आपली नैतिक जबाबदारी आहे.  म्हणून हे इतरांसोबत शेअर करा. 

संग्राहिका : सुश्री मीनल केळकर 

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ औषध ☆ श्री शामसुंदर महादेवराव धोपटे

श्री शामसुंदर महादेवराव धोपटे

?  वाचताना वेचलेले ? 

☆ औषध ☆ श्री शामसुंदर महादेवराव धोपटे ☆

स्वार्थाने बरबटलेल्या जगात आपल्याला यशापयशासकट जर कोणी स्वीकारत असेल, तर ते म्हणजे फक्त आपले आईबाबा. नेमके आपण त्यांना आपल्यापासून दूर करण्याचा अपराध करतो. ते त्याचीही खंत करत नाहीत. पिल्लं शरीराने आणि मनाने दूर गेल्याचे दु:खं सहन करतात आणि कधी चुकून जवळ आले, तर तितक्याच मायेने त्यांची चौकशी करतात. अशा प्रेमळ जन्मदात्यांना दुखवण्याचे पाप कधीही करू नका…

एक मेडिकलचे दुकान होते. औषध घेण्यासाठी लोकांची गर्दी होती. मेडिकलवाला शक्य तेवढ्या लवकर प्रत्येकाला अचूक औषध देत गर्दी कमी करत होता. त्याचा सहाय्यकही आपले काम चोखपणे पार पाडत होता. त्याचवेळेस रस्त्याच्या पलिकडच्या बाजूला झाडाखाली एक बाई मेडिकलकडे बघत ताटकळत उभी होती. बहुदा ती मेडिकलमधील गर्दी कमी होण्याची वाट बघत असावी. मेडिकलवाल्याचे तिच्याकडे लक्ष गेले. तिची अस्वस्थता पाहून त्याने काही वेळ सहाय्यकाला दुकानाकडे लक्ष दे असे सांगून आजीकडे धाव घेतली. 

आजीने त्याला पाहिले. तिला खुशाली वाटली. आजीच्या राहणीमानावरून ती मध्यमवर्गीय कुटुंबातली वाटत होती. मेडिकलवाल्याने तिला कोणते औषध हवे, असे विचारले. आजीच्या डोळ्यातून पाणी येऊ लागले. मेडिकलवाला म्हणाला, `काय झाले आजी, औषध घ्यायला पैसे नाही का?’आजी म्हणाली, `पैसे आहेत, पण मला हवे असलेले औषध तुझ्याकडे आहे का?’

मेडिकलवाला गोंधळला. त्याने आजीकडे औषधाचा कागद मागितला. तो आजीकडे नव्हता. आजी म्हणाली, `लेका, माझा मुलगा तुझ्याच वयाचा असेल. तो बायको मुलांना घेऊन दूर राहतो,  दर सुटीत मला भेटायला येतो. पण गेली काही वर्षे तो भेटायला तर येत नाहीच, वरून न येण्याची कारणे चिठ्ठीत लिहून पाठवतो. म्हणून मला एकच औषध हवे आहे, मला मूल आहे हे विसरण्याचे…आहे का तुझ्याकडे तसे औषध???’

मेडिकलवाला नि:शब्द झाला. कारण, या औषधाची गरज आज अनेक पालकांना निर्माण झाली आहे, अद्याप या औषधाची निर्मिती झालेली नाही. खरोखरच असे औषध निर्माण झाले, तर म्हातारपणी कित्येक पालकांना होणाऱ्या वेदना तरी कमी होतील…!’

——मित्रांनो, सगळ्यात मोठे कोणते पाप असेल, तर ते म्हणजे आपल्यामुळे आपल्या पालकांच्या डोळ्यात अश्रू येणे. त्या पापाचे प्रायश्चित्त कोणत्याही पुराणात दिलेले नाही. म्हणून हे पाप आपल्या हातून घडणार नाही, याची अवश्य काळजी घ्या !  

संग्राहक : श्री शामसुंदर महादेवराव धोपटे

चंद्रपूर,  मो. 9822363911

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ देशाची समृद्धी भारतीय रेल्वे – भाग -4 ☆ सौ. पुष्पा नंदकुमार प्रभुदेसाई

सौ. पुष्पा नंदकुमार प्रभुदेसाई

?  विविधा ?

☆ देशाची समृद्धी भारतीय रेल्वे – भाग -4 ☆ सौ. पुष्पा नंदकुमार प्रभुदेसाई ☆

(चरैवेति  चरैवेति)

[नागपूर येथून प्रसिद्ध होणा-या ‘राष्ट्रसेविका’ या अंकासाठी  सौ.पुष्पा प्रभू देसाई यांच्या भारतीय रेल्वेवरील लेखाची निवड झाली आहे. तो आपल्या वाचनासाठी चार भागात देत आहोत.]

भारतीय रेल्वेची भूमिका काय वर्णावी ! भारतीय रेल्वे देशाच्या आर्थिक, सामाजिक, विकासात अग्रेसर आहे. कला, इतिहास ,साहित्य, रहाणीमान, यावर तिचा अदभुत प्रभाव पडला आहे. वेगवेगळ्या प्रांतातील विविधतेत एकता येत असल्याने, ती राष्ट्रीय अखंडतेचे प्रतिक मानायला काय हरकत आहे? दिवसाकाठी अब्जावधी लोक, सर्वात किफायतशीर अशा रेल्वेचा प्रवासासाठी उपयोग करतात. मला आठवतं १९६९–७०च्या सुमारास मिरज– विश्रामबाग आमचा  कॉलेजचा प्रवास तीन महिन्याच्या पासला चार रुपये असा होता .किती स्वस्त ना! मालवाहतूक ,कोळसा, खते ,शेती उत्पादने, पोलाद, खनिजतेल, इतकंच काय दुष्काळी भागात, पाणीसुद्धा पोचविण्यासाठी रेल्वे हा उत्तम पर्याय आहे .शिवाय रेल्वे चा ७0 टक्के महसूल हा मालवाहतूक मिळतो .प्रवासी वाहतूकीतूनही  बऱ्यापैकी उत्पन्न मिळते. अगदी साधी गोष्ट प्रवाशांनी तिकिटे रद्द केल्याने सुद्धा (२०१७ ते २०२०) रेल्वेला ९६ हजार कोटी रुपयांचा महसूल मिळाला आहे. अलीकडेच पुणे विभागाने फुकटे प्रवासी पकडून आठ कोटी रुपयांचा दंड वसूल केला आहे .उत्पन्नवाढीसाठी आता रेल्वेने संरक्षक भिंती, पूल, ओव्हर ब्रिज, यावर आता खाजगी जाहिराती लावायला सुरुवात केली आहे या इतक्या प्रचंड पसार्याचे व्यवस्थापन करताना रेल्वेलाही अनेक अडचणींना तोंड द्यावे लागते. ए. सी. फस्ट क्लास, आणि विमान प्रवास यांच्या तिकिटात फारसा फरक नसल्याने कमी वेळेत पोचण्यासाठी प्रवासी विमान प्रवास  पसंत करतात . झुरळ, उंदीर ,घुशी, प्रवाशांनी केलेली अस्वच्छता यावरही बराच खर्च करावा लागतो. सध्या गणेशोत्सवामुळे चाकरमान्यांसाठी कोकणात जाण्यासाठी २२७  फेऱ्या (कोकण रेल्वेच्या) करण्याची मोदींनी तयारी दर्शविली आहे. जी मोदी एक्सप्रेस म्हणून धावत आहे. तसेच ‘ग्रीनफिल्ड,’ एक्सप्रेसचे सर्वेक्षण चालू आहे. मुंबई ते सिंधुदुर्ग ती  सहा तासात पोचेल. त्यासाठी  ७०,०००कोटी खर्चाची योजना आहे .अखंड प्रगती चालूच आहे .सी लिंक रोड, प्रमाणेच चार पूल बांधून ,रेल्वे  मार्ग  बांधण्याचा विचारही चालू आहे. त्यासाठी ७५००० कोटी खर्च अपेक्षित आहे. दिवसेंदिवस रेल्वेचा विकास आणि प्रगती चालूच आहे. यापूर्वीचे रेल्वे मंत्री पियूष गोयल यानी उत्तम काम केले आहे. तसेच आताही अश्विनी वैष्णवसारखी अत्यंत कर्तबगार हुशार व्यक्ती रेल्वे मंत्री म्हणून काम करीत आहेत. जयप्रकाश व्यास युनिव्हर्सिटीमधून इंजिनीयर होऊन आय. आय .टी. कानपुरहून ते एम टेक झाले. पेन सिलवानिया मधून एम बी ए झाले.  आज ते एक मोठे आणि जबाबदारीचे पद यशस्वीरित्या भूषवित आहेत.

  अशा या झुक झुक गाडी कडे पाहिलं की मला तिची अनेक रूप दिसतात. लुटू-लुटू रांगते, अशी गोंडस  नँरोगेज गाडी. गुडू गुडू चालते ,अशी पॅसेंजर गाडी. जोरात जोरात धावते ,अशी एक्सप्रेस गाडी.  वायू सम तुफान पळते,अशी सुपरफास्ट गाडी. ताठ्यात, तोर्यात, झोकात चालते, ती वातानुकूलित गाडी. किती वर्णन करावीत तिची!. कवी वसंत बापटनाही शब्द सुचले, “दख्खनच्या राणीच्या बसून कुशीत, शेकडो पिलेही  चालली खुषीत”.किती छान!पूर्वी आतुरतेने वाट पहात असताना घरी येणारी पत्र ही रेल्वेच आणून देत होती ना ! प्रत्येक माणसाच्या आयुष्याच्या प्रवासात, जसे अनेक लोक येत असतात .जात असतात .तसाच काहीसा हा रेल्वेचा प्रवास, समांतर रुळावरून चालणारा! सुरुवातीच्या स्टेशन पासूनचा प्रवास करताना, काही मधेच उतरून जातात .काहीजण बराच काळ सहज सोबत करतात. एखादा दोन-तीन स्टेशन पर्यंतच, पण स्मृतीत राहावी अशीच सोबत करतो. एखादा नोकरीसाठी जाणारा तरुण , एखादा मिलिटरी तला जवान, माहेर सोडून सासरी जाणारी नववधू, कोणी बारशाला ,कोणी लग्नाला, कोणी ट्रीपला ,अशा अनेक भावभावनांचे मिश्रण असलेल्यांना, स्वतःसह घेऊन जाणारी ही रेल्वे प्रत्येकालाच हवीहवीशी वाटते. आवडते. आपुलकीची वाटते. तिचं किती कौतुक करावं बरं ! इंग्रजांनी बीजारोपण केलेलं रेल्वेचे रोपट, आज त्याचा अभिमान वाटावा असा सुंदर डेरेदार वृक्ष झाला आहे. अजूनही तो वाढतोच आहे. वाढतोच आहे. भारताची महान समृद्धी म्हणून मिरवतो आहे . चरैवेति चरैवेति.

 समाप्त

©  सौ. पुष्पा नंदकुमार प्रभुदेसाई

बुधगावकर मळा रस्ता, मिरज.

मो. ९४०३५७०९८७

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ Speak up before you give up  – सुश्री वृषाली दाभोळकर ☆ प्रस्तुती – सौ.अस्मिता इनामदार

सौ.अस्मिता इनामदार

⭐ मनमंजुषेतून ⭐

☆ Speak up before you give up  – सुश्री वृषाली दाभोळकर ☆ प्रस्तुती – सौ.अस्मिता इनामदार ☆

Speak up before you give up – 

‘डिप्रेशन‘  या विषयावर आपण सध्या बऱ्याच पोस्ट वाचतोय. मीही आज माझा अनुभव शेअर करतेय – वयाच्या १९ व्या वर्षी मी सरकारी नोकरीत रुजू झाले आणि ३९ वर्षे सर्व्हिस करून जानेवारी २०२०मधे स्वेच्छानिवृत्ती घेतली. माझी पोस्ट Clerical. पण मला बरीच वर्षे माझ्या पोस्ट पेक्षा अधिक जबाबदारीचे काम करण्याची संधी मिळाली e.g. GM/DGM Secretariat. 

ऑफिस मधील बहुतेक सर्व कमिटीजमध्ये काम करण्याची संधी मिळाली. सर्व काही छान चालले होते. ऑफिसमधील वेगवेगळ्या सेक्शनमधील कामाचा अनुभव मी घेतला. क्रेडिट सोसायटी, युनियन सर्वच ठिकाणी मी अॅक्टिव होते. थोडक्यात ऑफिस हेच आयुष्य बनले होते.

५-६ वर्षापूर्वी माझ्या मुलाला डेंग्यू झाला. तो ठाण्यात हॉस्पिटल मधे अडमिट होता. प्लेटलेट्स कमी होत होत्या, काळजी वाढत होती. मी त्याच्याबरोबर होते आणि त्याचदरम्यान माझी बदली  त्याच बिल्डिंगमधे एका अश्या ठिकाणी झाली/केली गेली ज्याची मी कधी अपेक्षाच केली नव्हती. एक आऊटसोर्स  केलेले डिपार्टमेंट  पुन्हा ताब्यात घेऊन तेथे स्टाफची नेमणूक करण्यात आली होती. सरकारी खात्यात असलेल्या सर्व असुविधा तेथे होत्या. गेट जवळील वॉचमनरूमशेजारील छोटी रूम, पत्र्याची शेड, डासांचे साम्राज्य…. १५-२०दिवसानंतर मुलाची तब्बेत सुधारल्यावर मी ऑफिसला नवीन सेक्शनमध्ये जॉईन झाले.  ऑफिसवर/तिथल्या कामावर मनापासून प्रेम होते त्यामुळे कामात लक्ष नसणे/चुका होणे असे कधी सुदैवाने झाले नाही, किंवा ऑफिसला जाऊ नये असेही कधी वाटले नाही. पण मनावर कुठेतरी खोलवर परिणाम झाला होता. घटना छोटीशी असते —आता कुणीही म्हणेल की सरकारी खात्यात एका डिपार्टमेंटमधून त्याच बिल्डिंगमधे दुसऱ्या डिपार्टमेंटमध्ये बदली यात काय विशेष? अगदी खरंय… मला हेच तर सांगायचे आहे. एखादी छोटीशी घटना तुमच्या मनाला किती खोल जखम करून जाईल सांगता येत नाही. ऑफिसचे काम व्यवस्थित चालू होते त्यामुळे कुणालाही माझ्या मानसिक स्थितीचा अंदाज येणे शक्य नव्हते. मलाही नक्की काय होतंय हे समजत नव्हते. सतत कुठलातरी अवयव दुखायचा, कधी पाठ तर कधी हात.. डॉक्टरच्या फेऱ्या– पण टेस्टचे रिपोर्ट मात्र नॉर्मल. आजार शरीराला नाही तर मनाला झालाय हे समजतच नव्हते. रात्रीची झोप येत नव्हती, बेचैनी वाढत होती. कुठल्याही गोष्टीचा आनंद वाटेनासा झाला होता. दरम्यान मुलाने आणि सुनेने पवईसारख्या एरियात फ्लॅट घेतला, होंडा कार  घेतली. खरंतर किती आनंदाचे प्रसंग ! माझ्या डोक्यात मात्र निगेटिव्ह विचारांनी थैमान घातले होते. हे काहीतरी वेगळे आहे हे माझ्या लक्षात येऊ लागले होते, पण उपाय सापडत नव्हता. काहीच दिवसात परिस्थिती आणखी बिघडली – मी ९ व्या मजल्यावर राहते. घराला दोन टेरेस.  मला असे वाटू लागले की मी आता टेरेसमधून खाली उडी मारणार…. खूप भीती वाटायची, मी टेरेसची दारे बंद ठेवू लागले. आश्चर्याची गोष्ट म्हणजे मी ऑफिसला अगदी नेहमीप्रमाणे टापटीप, छान साड्या/ड्रेस घालून जात होते, काम अगदी व्यवस्थित करत होते.  त्यामुळे माझ्या मनात काय चालले आहे हे कुणालाही समजत नव्हते. दरम्यान मी ठाण्याला माझ्या विहीणबाईंकडे गेले असता त्यांच्याशी बोलले. त्यांनी डॉ आनंद नाडकर्णी यांच्या IPH (Institute of Psychological Health)  या  संस्थेतील डॉ कवलजीत यांची अपॉइंटमेंट घेतली. आम्ही डॉक्टरांची भेट घेतली. कवलजीताना  माझी मातृभाषा समजत नव्हती,  पण माझ्या मनाचा आजार समजला होता. त्यांनी मला या आजारा – विषयी संपूर्ण माहिती सांगितली व तो लगेच बरा होणार नसल्याचेही सांगितले. औषधे सुरू झाली. प्रश्न होता तो मी हा आजार स्वीकारण्याचा . जसा शरीराला आजार होतो तसा आपल्या मनाला झालाय आणि यातून आपल्याला यशस्वीपणे बाहेर पडायचे आहे हे मनाला आणि मेंदूलाही पक्के समजावले. या आजाराशी लढताना मला माझ्या कुटुंबाचीपण खूप चांगली साथ मिळाली. माझ्या डोळ्यातून अनेकदा वाहणाऱ्या अश्रूंचा अर्थ त्यांना समजू लागला होता. टीव्हीवर हाणामारीचे किंवा दुःखाचे प्रसंग दिसताच चॅनल बदलले जाऊ लागले होते. माझ्यात हळूहळू सुधारणा होऊ लागली. ७-८ महिन्यानंतर ३ गोळ्यापैकी २ गोळ्या बंद झाल्या. दरम्यानच्या काळात मी पुण्यातील IPH मधेही ट्रीटमेंट घेतली– आता गाडी पूर्वपदावर आली आहे. छोट्या छोट्या गोष्टीतून आनंद घेऊ लागले आहे. सकाळी चहा पिणे , पेपर वाचणे तर संध्याकाळी सूर्यास्त  बघणे असा माझ्या टेरेसचा मनसोक्त आनंद घेत आहे. माझ्या आयुष्यातील आनंद परत मिळवून दिल्याबद्दल डॉ आनंद नाडकर्णी आणि त्यांच्या टीमचे मनापासून आभार. अर्थात या आजारावर आपल्याला मात करायची आहे या माझ्या मनाच्या निग्रहाचीही खूप मदत झाली. एवढं सगळं लिहिण्याचा उद्देश हाच की साधारणपणे हा आजार दडवून ठेवण्याची मानसिकता असते. समाज काय म्हणेल त्याचे भय असते. कुटुंबाकडूनही– दुर्लक्ष कर, लोकांच्यात मिसळ, हसत राहा, छंदात मन रमव– असे सल्ले दिले जातात आणि उपचार घेण्याचे टाळले जाते. मी खरंच सांगते, त्या मानसिक अवस्थेत हे कुठलेही सल्ले मेंदूपर्यंत पोहोचतच  नाहीत तर उपयोगी कुठून पडणार? हे सारे लाभदायक ठरते ते मानसिक अवस्था सुधारल्यानंतरच. साधारणपणे सेलिब्रिटीज,राजकारणी , प्रसिद्ध खेळाडू, श्रीमंत वर्गातील लोक या आजाराचे शिकार होतात असे समजले जाते. तसेच, डिप्रेशन  कर्जबाजारी झाल्यामुळे, प्रेमभंग झाल्यामुळे किंवा मोठ्या अपयशामुळे येते असेही नाही. तेव्हा कृपया आपल्या वागण्यात काही बदल झालाय का, आपण उगाचच इमोशनल होतोय का, काहीतरी आपल्या मनाला बोचत आहे का याकडे लक्ष द्या, वेळीच जवळच्या व्यक्तीजवळ बोला, दुर्लक्ष करू नका किंवा समोरची व्यक्ती आपल्याला काही सांगत असेल तर त्याकडेही नक्कीच दुर्लक्ष करू नका. कदाचित तिला तुमच्या मदतीची गरज असेल. मुख्य म्हणजे गरज पडल्यास ट्रीटमेंट जरूर घ्या, टाळाटाळ करू नका. आयुष्यापेक्षा काहीही महत्वाचे नाही. डिप्रेशन मधून तुम्ही नक्की बाहेर येऊ शकता हे मी माझ्या अनुभवावरून सांगते.

माझी ही पोस्ट वाचली की काहीजण  मला कदाचित बिचारी म्हणतील, यापुढील काळात माझ्या एखाद्या वाक्याचा/वागण्याचा माझ्या डिप्रेशनशी संबंध लावला जाईल. पण मला ते महत्वाचे मुळीच वाटत नाही.  उलट या पोस्टचा एखादया व्यक्तीला जरी फायदा झाला तरीही ती या एवढ्या मोठ्या पोस्टची अचिव्हमेन्ट असेल.

ले : सुश्री वृषाली दाभोळकर

प्रस्तुती – सौ अस्मिता इनामदार

पत्ता – युनिटी हाईटस, फ्लॅट नं १०२, हळदभवन जवळ,  वखारभाग, सांगली – ४१६ ४१६

मोबा. – 9764773842

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ उकडीचा मोदक.. ☆ संग्रहिका – सुश्री प्रभा हर्षे

? वाचताना वेचलेले ?

☆ उकडीचा मोदक ☆ संग्रहिका – सुश्री प्रभा हर्षे ☆

उकडीचा मोदक करणे हा एक मोठा सोहळा आहे.

हा पदार्थ – पाव इंच आले, एक टेबलस्पून मीठ, ओव्हनचं टेम्परेचर, कुकरच्या शिट्ट्या … असं लिहिणार्‍या पुस्तकात बघून करता येत नाही त्यासाठी उगीच एवढंसं चिमटीभर मीठ, एक तारी पाक, मंद आच, दोन उकळ्या आणणे, कणीक थोडीशी सैलसर भिजवणे … ही भाषा यावी लागते. नारळ किसणे, कापणे, तुकडे करणे वगैरे म्हणणार्‍या मंडळीनी जरा सांभाळूनच यात पडावे. 

—-नारळ गुहागरी असतील तर चव वेगळी ….

—-राजापुरी असतील तर चव वेगळी ….

—-दापोली आसूद या बाजूची गोडी वेगळी ….

—-नारळ तारवटी असेल अजून वेगळी ….

तर हे सगळे समजून गूळ कमीजास्त करायचा असतो. 

मुळात नारळ उत्तम खवता यायला हवा. त्यात करवंटीची साल येता कामा नये. खवणीवर उकिडवं बसून खवल्यास खोबरं अधिक गोड लागतं. मधून मधून खोब-याचा तोबराही भरावा.

—-तांदूळ हा नवा असावा–.नव्या नवरी सारखा ! म्हणजे उकड ‘लग्न झाल्यानंतर पहिल्या काही दिवसातील नवरा बायकोच्या नात्यासारखी’ छान चिकट होते. आंबेमोहोर वा बासमती तांदूळ असेल तर मोदकालाच मोद होतो—-.तांदूळ स्वच्छ धुवून घ्यावेत व ते शक्यतो सावलीत फडक्यावर वाळवावेत ….. ही पिठी आता जात्यावर घरी करणे अशक्य, म्हणून गिरणीत स्वतःच्या देखरेखीखाली—- भैय्याला, ” अरे भय्या, ये गहू पे मत डालो. दुसरा तांदूळ आयेगा ना पिसनेको उसके उप्पर डालो” वगैरे सांगून बारीक दळून घ्यावी.

—–गूळ अश्विनातल्या उन्हासारखा, लग्नात मामाने नेसवलेल्या अष्टपुत्रीसारखा पिवळाधमक असावा.  किसल्यानंतर ताटात झेंडूच्या फुलांच्या पाकळ्यांची पखरण  झाली आहे असे वाटले पाहिजे.

—-खोबरे आणि गूळ यांना मंदाग्नीवर शिजत ठेवावे. खोबर्‍याच्या संगतीत गूळ हळूहळू 

विरघळत जातो व दोघे एकजीव होतात. 

—-हे होताना— चमचाभर तांदळाची पिठी व थोडी प्रत्येक दाणा वेगळा असलेली खसखस भाजून घालावी.आणि वेलदोड्याची पूड करून थोडी पखरावी. ह्या सर्व पदार्थांचे सारण तयार करावे.

—-यातील ‘कुठल्या गोष्टी किती प्रमाणात’ ते आई, आज्जी, सासुबाई, आजेसासूबाई यांनी सांगावे व नवीन सुनेने ते एकत्र परतावे.

—–जेवढे तांदळाचे पीठ तेवढेच पाणी घ्यावे. त्यात चवीला मीठ, दोन चमचे साजूक तूप व एक छटाकभर तेल घालावे. नंतर मंद आचेवर ठेवून ते ढवळावे. दोन वाफा आणाव्यात. 

—–पीठ अंतर्यामी भिजले आणि तूप-तेल यांच्या मर्दनाने शिजले पाहिजे.

—–सगळ्यात यापुढे खरी कसरत चालू होते. 

—–ही उकड मळणे हा एक खास प्रकार आहे. त्यात एकही गाठ राहता कामा नये. कुठेही आणि कशीही वळणारी या उकडीची गोगलगाय व्हायला हवी.

——लिंबाएवढी उकडीची गोळी घ्यायची आणि या गोळीवर हाताने संस्कार करायचा. मध्यभागी  ‘पुढील संसाराची जबाबदारी वाहू शकेल’ अशी थोडी मजबूत कणखर जाड ठेवून बाजूने संस्कारांचा, शिक्षणाचा दाब देऊन –तिला नाजूक, सुंदर मुलीसारख्या चिमटीने कडा दाबून चुण्या करुन सौष्ठव द्यावे.–आत सारण भरावे आणि सारणाचा भुंगा आत अडकला की कमळासारख्या पाकळ्या –म्हणजे नऊवारी नेसलेल्या या पापडीच्या नि-या अलगद, नाजूक 

हाताने मिटत न्याव्यात.

—-स्वतःचे नसले तरी मोदकाचे नाक चाफेकळी हवे. नंतर या जोडीला मोदक पात्रात घालून मस्त वाफ आणावी.

—-असा लुसलुशीत मोदक पानात वाढला की या फुलाचे नाक रूपी देठ काढून टाकावे व मगाशी वाफेमुळे गुदमरलेल्या मोदकाच्या श्वासनलिकेत साजूक तूप ओतावे. मग हळूच पूर्ण मोदक उचलून तो आपल्या अन्ननलिकेत सरकवावा——.

——-तृप्तता म्हणजे काय … याचा याची देही याची डोळा प्रत्यय घ्यावा !!!

संग्रहिका –  सुश्री प्रभा हर्षे 

पुणे

भ्रमणध्वनी:-  9860006595

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ देशाची समृद्धी भारतीय रेल्वे – भाग -3 ☆ सौ. पुष्पा नंदकुमार प्रभुदेसाई

सौ. पुष्पा नंदकुमार प्रभुदेसाई

?  विविधा ?

☆ देशाची समृद्धी भारतीय रेल्वे – भाग -3 ☆ सौ. पुष्पा नंदकुमार प्रभुदेसाई ☆

(चरैवेति  चरैवेति)

[नागपूर येथून प्रसिद्ध होणा-या ‘राष्ट्रसेविका’ या अंकासाठी  सौ.पुष्पा प्रभू देसाई यांच्या भारतीय रेल्वेवरील लेखाची निवड झाली आहे. तो आपल्या वाचनासाठी चार भागात देत आहोत.]

भारतीय रेल्वेची मालकी, रेल्वे मंत्रालयाद्वारे भारत सरकारकडे आहे. सोळा विभागांनी शिवाय भारतीय रेल्वेचे सहा उत्पादन केंद्राचे अधिकारीही , रेल्वे बोर्डाला जबाबदार असतात .  रेल्वेचे अंदाज पत्रक दर वर्षी वाढतच आहे .आधुनिकीकरण आणि विकास करण्याचा त्यात प्रस्ताव असतो .प्रवासी आणि मालवाहतुकीचे भाडे ठरविण्यात येते. तसेच लोकसभेत साध्या बहुमताने संमत असावे लागते. रेल्वेलाही लेखा परीक्षेचे नियम लागू असतात. महसुली खर्च भांडवली तुटवडा भारत सरकार भरून काढते. किंवा इंडियन रेल्वे फायनान्स कडून उसने घेतले जातात. २०२० सालचे ७० हजार कोटींचे अंदाजपत्रक आहे. त्यामध्ये अत्यंत उपयुक्त अशा अनेक तरतुदी आहेत.

रेल्वेमार्गाच्या दोन्ही बाजूच्या मोकळ्या जागा सौर ऊर्जा निर्मितीसाठी वापरल्या जातील. दीडशे प्रवासी गाड्या प्रायव्हेट पार्टनरशिप तत्त्वावर देण्याचा विचार असून प्रमुख पर्यटन स्थळे, तेजस सारख्या गाड्यांनी जोडण्याची योजना आहे. परदेशी प्रवाशांना जागतिक दर्जाच्या सेवा सुविधांसह प्रवास उपलब्ध करून देण्याची योजना आहे. चोऱ्या आणि आतंकी हमला पासून सुरक्षिततेसाठी स्टेशन मध्ये क्लोज सर्किट कॅमेरे बसवले आहेत. घर बसल्या मोबाईल वर आपण तिकीट काढू शकतो. सर्व डब्यांमध्ये जैव शौचालये आहेत. गाडीतच जेवण मागविता येते. फलाटावर आपला डबा कोठे येणार ,याची बिनचूक माहिती कळू लागली आहे. कोकण रेल्वेने सुरक्षेसाठी, जगातील पहिलेच उपकरण विकसित केले आहे. हे उपकरण सिग्नलिंग प्रणाली आणि इंटरलॉकिंग प्रणालीशी जोडले गेल्यामुळे दुर्घटना कमी झाल्या. नॉर्थ ईस्ट  फ्रांटियर  रेल्वे मधे हे उपकरण यशस्वीरित्या काम करत आहे. मोठमोठ्या मेट्रो सिटी मध्ये, आता मेट्रो धावायला लागली आहे . २००२ला दिल्ली मेट्रो ट्रेन सुरू झाली. भारतातील  प्रख्यात सिव्हिल इंजिनियर श्रीधरन  १९९५ ते  २०१२ पर्यंत दिल्ली मेट्रोचे  निदेशक होते. ते भारताचे मेट्रोमॅन ठरले. त्यांचा पद्म आणि पद्मविभूषण देऊन सत्कार केला .मुंबई ,गुरुग्राम, हैदराबाद, कोची ,लखनऊ अनेक ठिकाणी, मेट्रोचा लाभ लोक घेत आहेत. कमीत कमी खर्चात जास्त सुविधा, आरामदायी ,आणि सुरक्षितता, तसेच रस्त्यांवरील गर्दीही कमी झाली .आज  १६ लाख कर्मचारी भारतीय रेल्वेत काम करतात. त्यामुळे रोजगारही वाढला .दर दिवशी ,१४000 गाड्या धावतात. पण तरीही प्रवाशांची मागणी पूर्ण होत नाही .सण, उत्सवांच्या वेळी आरक्षण मिळत नाही. आज महिलांना ही रोजगार मिळायला लागला आहे .कौतुकाची गोष्ट म्हणजे आशियातील पहिली महिला इंजिन ड्रायव्हर सुरेखा यादव ,सिव्हिल सर्विस मधील रेल्वे सुरक्षा अधिकारी सुचिता चटर्जी, पहिली सहाय्यक स्टेशन मास्तर रिंकू सिन्हा राँय या उत्तम काम करीत आहेत.

भारतीय रेल्वेचा पसारा सांगायचा तर ,अरे बापरे केवढा अवाढव्य! भारतीय रेल्वे ही भारताची खूप मोठी समृद्धी आहे. भारतातील रेल्वेचे नेटवर्क, अशियात प्रथम क्रमांकाचे आणि जगात दुसऱ्या क्रमांकाचे आहे.ही सर्वात मोठी सरकारी संस्था आहे.६५०००पेक्षा जास्त इंजिन्स, डबे, वाघिणी, कार्यरत आहेत. ५५०००कि.मि.ब्राँडगेज(७५  ) ८०००कि.मि.मिटरगेज(२१ 

आणि साधारण २५००कि.मि. नँरोगेज असा हा पसारा आहे. नँरोगेज मुख्यतः डोंगरी भागात चालतात.भारतीयांनी अभिमानाने आणि ताठ मानेने सांगाव्यात अशा रेल्वेच्या आणखीही काही गोष्टी सांगता येतील. दार्जीलिंग हिमालयीन रेल्वे मार्गावरील ,’धूम’ हे ठिकाण २१३४मि.उंच आहे. मुंबईचे जी. एस .टी .स्थानक, निलगिरी पर्वत  रांगां मधून जाणारी निलगिरी माउंटन रेल्वे, यांनी आज युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत स्थान मिळविले आहे. जम्मू कश्मीर  — बारामुल्ला दरम्यानचा ‘पीर पंजाल ‘बोगदा,(११कि.मि.) भारतातील सर्वात मोठा बोगदा आहे त्याचप्रमाणे सर्वात मोठे रेल्वे मार्ग म्हणजे कन्याकुमारी ते जम्मू तावी पुढे ती बारामुल्ला पर्यंत (३७४५कि मि.) ,विवेक एक्स्प्रेस दिब्रुगड ते कन्याकुमारी (४२३३ कि.मि.) तिरुअनंतपुरम ते सिलचर(३९३२ कि.मि.) तिरूनेलवे्ल्ली ते जम्मू(३६३१कि.मि )  सर्वात मोठा फलाट खरगपूर (२७३३ फूट). सर्वात व्यस्त स्टेशन लखनौ. सिक्कीम आणि मेघालय येथे रेल्वेचे जाळे नाही. फेअरी क्वीन हे जगातील सर्वात जुने(  १८५५ मधले )  अजून चालू आहे. आणखी अभिमानाने सांगता येईल अशी गोष्ट म्हणजे चेन्नई येथील कोच फॅक्टरी(i, c, f,)  ही जगातील सर्वात मोठी   कोच  निर्माण करणारी, फॅक्टरी आहे एप्रिल २०१८ पासून फेब्रुवारी२०१९ पर्यंत या कंपनीने, २९१९ कोच तयार केले. याच कंपनीने देशातील पहिली हायस्पीड रेल्वे,” वंदे भारत एक्सप्रेस ” सुरू केली. ती नवी दिल्ली ते वाराणसी  मार्गावर

धावते. या कंपनीने शंभर कोटी मध्ये  ती  तयार केली .ज्याला बाहेर दोनशे ते तीनशे कोटी खर्च आला असता. या गाडीने एक वर्षात, चार लाख किलोमीटर पेक्षा जास्त प्रवास करून ,शंभर कोटी उत्पन्न मिळविले .इतकंच काय  पण श्रीलंकेलाही (D.E.M.U)   डिझेल मल्टिपल युनिट्स ट्रेन निर्यात केली आहे. तसेच (E.M.U)इलेक्ट्रिक मल्टिपल युनिट रेल्वे तयार केली आहे.अशी पहिलीच गाडी ,ज्याचे पंखे आणि लाईट ,सौर उर्जेवर चालतील. छतावर सोलर पॅनेल बसविलेले आहेत. रेल्वे बाबत आणखी एक मजेशीर गोष्ट सांगायची म्हणजे देशातील जवळ जवळ पंधरा हजार रेल्वे गाड्यांद्वारे कापले जाणारे अंतर, पृथ्वी आणि चंद्रामधील  अंतराच्या साडेतीन पट आहे.

क्रमशः….

©  सौ. पुष्पा नंदकुमार प्रभुदेसाई

बुधगावकर मळा रस्ता, मिरज.

मो. ९४०३५७०९८७

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ जयतु संस्कृतम् जयतु भारतम् ☆ संग्रहिका – सुश्री आनंदी केळकर

?इंद्रधनुष्य? 

☆ जयतु संस्कृतम् जयतु भारतम् ☆ संग्रहिका – सुश्री आनंदी केळकर ☆ 

भारतातील अती महत्वाच्या संस्थांची  घोषवाक्ये संस्कृत मधील आहेत. अवश्य  वाचा. 

  • भारत सरकार ? सत्यमेव जयते
  • लोक सभा ? धर्मचक्र प्रवर्तनाय
  • उच्चतम न्यायालय ? यतो धर्मस्ततो जयः
  • आल इंडिया रेडियो ? सर्वजन हिताय सर्वजनसुखाय‌
  • दूरदर्शन ? सत्यं शिवं सुन्दरम्
  • गोवा राज्य ? सर्वे भद्राणि पश्यन्तु, मा कश्चिद् दुःखभाग्भवेत्।
  • भारतीय जीवन बीमा निगम ? योगक्षेमं वहाम्यहम्
  • डाक तार विभाग ? अहर्निशं सेवामहे
  • श्रम मंत्रालय ? श्रम एव जयते
  • भारतीय सांख्यिकी संस्थान ? भिन्नेष्वेकस्य दर्शनम्
  • थल सेना ? सेवा अस्माकं धर्मः
  • वायु सेना ? नभःस्पृशं दीप्तम्
  • जल सेना ? शं नो वरुणः
  • मुंबई पुलिस ? सद्रक्षणाय खलनिग्रहणाय
  • हिंदी अकादमी ? अहं राष्ट्री संगमनी वसूनाम्
  • भारतीय राष्ट्रीय विज्ञान अकादमी ? हव्याभिर्भगः सवितुर्वरेण्यम्
  • भारतीय प्रशासनिक सेवा अकादमी ? योगः कर्मसु कौशलम्
  • विश्वविद्यालय अनुदान आयोग ? ज्ञान-विज्ञानं विमुक्तये
  • नेशनल कौंसिल फॉर टीचर एजुकेशन ? गुरुर्गुरुतमो धाम
  • गुरुकुल काङ्गडी विश्वविद्यालय ? ब्रह्मचर्येण तपसा देवा मृत्युमपाघ्नत
  • इन्द्रप्रस्थ विश्वविद्यालय ? ज्योतिर्व्रणीत तमसो विज्ञानन
  • काशी हिन्दू विश्वविद्यालय: ? विद्ययाऽमृतमश्नुते
  • आन्ध्र विश्वविद्यालय ? तेजस्विनावधीतमस्तु
  • बंगाल अभियांत्रिकी एवं विज्ञान विश्वविद्यालय, शिवपुर ? उत्तिष्ठत जाग्रत प्राप्य वरान् निबोधत
  • गुजरात राष्ट्रीय विधि विश्वविद्यालय ? आनो भद्राः क्रतवो यन्तु विश्वतः
  • संपूणानंद संस्कृत विश्वविद्यालय ? श्रुतं मे गोपाय
  • श्री वैंकटेश्वर विश्वविद्यालय ? ज्ञानं सम्यग् वेक्षणम्
  • कालीकट विश्वविद्यालय ? निर्भय कर्मणा श्री
  • दिल्ली विश्वविद्यालय ? निष्ठा धृति: सत्यम्
  • केरल विश्वविद्यालय ? कर्मणि व्यज्यते प्रज्ञा
  • राजस्थान विश्वविद्यालय ? धर्मो विश्वस्य जगतः प्रतिष्ठा
  • पश्चिम बंगाल राष्ट्रीय न्यायिक विज्ञान विश्वविद्यालय ? युक्तिहीने विचारे तु धर्महानि: प्रजायते
  • वनस्थली विद्यापीठ ? सा विद्या या विमुक्तये।
  • राष्ट्रीय शैक्षिक अनुसंधान और प्रशिक्षण परिषद् ? विद्याsमृतमश्नुते।
  • केन्द्रीय विद्यालय ? तत् त्वं पूषन् अपावृणु
  • केन्द्रीय माध्यमिक शिक्षा बोर्ड ? असतो मा सद्गमय
  • प्रौद्योगिकी महाविद्यालय, त्रिवेन्द्रम ? कर्मज्यायो हि अकर्मण:
  • देवी अहिल्या विश्वविद्यालय, इन्दौर ? धियो यो नः प्रचोदयात्
  • गोविंद बल्लभ पंत अभियांत्रिकी महाविद्यालय, पौड़ी ? तमसो मा ज्योतिर्गमय
  • मदनमोहन मालवीय अभियांत्रिकी महाविद्यालय गोरखपुर ? योगः कर्मसु कौशलम्
  • भारतीय प्रशासनिक कर्मचारी महाविद्यालय, हैदराबाद ? संगच्छध्वं संवदध्वम्
  • इंडिया विश्वविद्यालय का राष्ट्रीय विधि विद्यालय ? धर्मो रक्षति रक्षितः
  • संत स्टीफन महाविद्यालय, दिल्ली ? सत्यमेव विजयते नानृतम्
  • अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थान ? शरीरमाद्यं खलुधर्मसाधनम्
  • विश्वेश्वरैया राष्ट्रीय प्रौद्योगिकी संस्थान, नागपुर ? योग: कर्मसु कौशलम्
  • मोतीलाल नेहरू राष्ट्रीय प्रौद्योगिकी संस्थान,इलाहाबाद ? सिद्धिर्भवति कर्मजा
  • बिरला प्रौद्योगिकी एवं विज्ञान संस्थान, पिलानी ? ज्ञानं परमं बलम्
  • भारतीय प्रौद्योगिकी संस्थान खड़गपुर ? योगः कर्मसुकौशलम्
  • भारतीय प्रौद्योगिकी संस्थान मुंबई ? ज्ञानं परमं ध्येयम्
  • भारतीय प्रौद्योगिकी संस्थान कानपुर ? तमसो मा ज्योतिर्गमय
  • भारतीय प्रौद्योगिकी संस्थान चेन्नई ? सिद्धिर्भवति कर्मजा
  • भारतीय प्रौद्योगिकी संस्थान रुड़की ? श्रमं विना न किमपि साध्यम्
  • भारतीय प्रबंधन संस्थान अहमदाबाद ? विद्या विनियोगाद्विकास:
  • भारतीय प्रबंधन संस्थान बंगलौर ? तेजस्वि नावधीतमस्तु
  • भारतीय प्रबंधन संस्थान कोझीकोड ? योगः कर्मसु कौशलम्
  • सेना ई एम ई कोर ? कर्म हि धर्म:
  • सेना राजपूताना राजफल ? वीर भोग्या वसुन्धरा
  • सेना मेडिकल कोर ? सर्वे संतु निरामया: ..
  • सेना शिक्षा कोर ? विद्यैव बलम्
  • सेना एयर डिफेन्स ? आकाशस्थ शत्रुन् जहि
  • सेना ग्रेनेडियर रेजिमेन्ट ? सर्वदा शक्तिशालिनः
  • सेना राजपूत बटालियन ? सर्वत्र विजयेम
  • सेना डोगरा रेजिमेन्ट ? कर्तव्यम् अन्वात्मा
  • सेना गढवाल रायफल ? युद्धाय कृतनिश्चयः
  • सेना कुमायू रेजिमेन्ट ? पराक्रमो विजयते
  • सेना महार रेजिमेन्ट ? यशसिद्धि
  • सेना जम्मू काश्मीर रायफल ? प्रस्थ रणवीरता
  • सेना कश्मीर लाइट इंफैन्ट्री ? बलिदानं वीरलक्ष्यम्
  • सेना इंजीनियर रेजिमेन्ट ? सर्वत्र
  • भारतीय तट रक्षक ? वयम् रक्षामः
  • सैन्य विद्यालय ? युद्धं प्रगायय
  • सैन्य अनुसंधान केंद्र ? बलस्य मूलं विज्ञानम्

– – – – – – – – – –

सिलसिला यहीं ख़त्म नहीं होता,

  • नेपाल सरकार ? जननी जन्मभूमिश्च स्वर्गादपि गरीयसी
  • इंडोनेशिया-जलसेना ? जलेष्वेव जयामहे (इंडोनेशिया) – पञ्चचित
  • कोलंबो विश्वविद्यालय- (श्रीलंका) ? बुद्धि: सर्वत्र भ्राजते
  • मोराटुवा विश्वविद्यालय (श्रीलंका) ? विद्यैव सर्वधनम् पेरादे पञ्चचित
  • पेरादेनिया विश्वविद्यालय ? सर्वस्य लोचनशास्त्रम्

जयतु संस्कृतम् जयतु भारतम् ।

संग्राहिका : सुश्री आनंदी केळकर

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ ‘अष्टविनायका तुझा महिमा कसा’ ☆ सौ. स्वाती रामचंद्र कोरे

सौ. स्वाती रामचंद्र कोरे

? वाचताना वेचलेले ?

☆ ‘अष्टविनायका तुझा महिमा कसा’ ☆ सौ. स्वाती रामचंद्र कोरे ☆

‘अष्टविनायका तुझा महिमा कसा’, एका रात्रीत तयार झालेल्या गाण्याचा किस्सा!!

श्री गणेश पुराणात अनेक चित्र विचित्र कथा आहेत. त्यामुळे भारतीय चित्रपटाचे जनक दादासाहेब फाळके यांच्यापासून अनेकांनी गणपतीवर काहीतरी नाविन्यपूर्ण चित्रपट काढण्याचे प्रयत्न केले आहेत. चित्रपट निर्माते शरद पिळगावकर त्यापै़कीच एक! पिळगावकरांच्या लक्षात आले की अष्टविनायक संदर्भ असलेला एकही चित्रपट आजपर्यंत आलेला नाही. विषयाचं नाविन्य ही कोणतीही कलाकृती यशस्वी होण्याची पहिली खूण असते. चित्रपट निर्मिती हा इतका अवघड विषय आहे की प्रत्येक निर्मात्याला नवनव्या अडचणींना तोंड द्यावे लागते. निर्माता या आव्हानांना कसे सामोरे जातो यावर चित्रपट निर्मितीचा संकल्प पूर्णत्वाला जातो अथवा नाही हे ठरत असतं.

अष्टविनायक हा चित्रपटही याला अपवाद नव्हता. सुरुवातीला नायक म्हणून विक्रम गोखले यांची निवड करण्यात आली होती. पण त्यांच्या अटी आणि सूचना पाहून पिळगावकरांनी त्यांचा नाद सोडला. आता प्रश्न होता की नायक कोण होणार? सचिन पिळगावकर यांचे त्यावेळी हिंदी चित्रपटसृष्टीत काम जोरात होते त्यामुळे घरीच नायक असूनही पिळगावकरांना नायक कोण हा प्रश्न पडला होता.

वडीलांची तारांबळ बघून सचिन एक दिवस म्हणाला, “मी अष्टविनायकमध्ये काम करतो. पण माझी एक अट आहे.”

आधीच विक्रम गोखलेंच्या अटींनी वैतागलेले शरद पिळगांवकर आपल्या मुलाला म्हणाले, “आता तुझ्यापण अटी? बरं, तरीपण तुझ्या अटी तर सांग.”

तेव्हा सचिन म्हणाला, “अष्टविनायक गाण्याच्या शूटींगच्या वेळी प्रत्येक ठिकाणी मी येणार. कटिग पेस्टिंग करून गाणं करायचं नाही.”

“डन”, शरद पिळगावकर म्हणाले. त्यांच्या दृष्टीने ही फार मोठी अडचण नव्हती.

आता नायिकेचा शोध सुरु झाला. भक्ती बर्वेंपासून अनेक नावं समोर आली. पण काही केल्या ते गणित जमेना. तेव्हा सचिनच्या मातोश्रींनी नाव सुचवलं- वंदना पंडित! आता ही वंदना पंडित कोण? असा प्रश्न अनेकांनी विचारायला सुरुवात केली. वंदना पंडित तेव्हा दूरदर्शनवर निवेदिका म्हणून काम करायची. झालं ठरलं, वंदना पंडित नायिका!

पण याच काळात तिचं लग्न ठरलं. त्यामुळे ती चित्रपटात काम करणार नाही असं तिचं उत्तर आलं. निर्मात्यांना अशा अडचणी फारशा कठीण वाटत नाहीत बहुतेक! कारण शरद पिळगावकरांनी निरोप पाठवाला, “लग्नाआधीच शूटिंग संपवलं तर?”

वंदना पंडित राजी झाली. होकार मिळाला. मुलीच्या वडीलांची भूमिका पंडित वसंतराव देशपांडे यांना द्यायचं ठरलं. पण तेव्हा वसंतरावांचे “कट्यार काळजात घुसली” चे प्रयोग जोरात चालू होते. त्यामुळे त्यांनी नकार दिला. पण पिळगावकर माणसांना राजी करण्यात हुषारच होते. त्यांनी पंडितजींना कसतरी पटवलं.

शूटिंग मार्गी लागलं.

“आली माझ्या घारी ही दिवाळी”, ‘”दाटून कंठ येतो” ही गाणी रेकॉर्ड पण झाली. पण यानंतर एक मोठा प्रश्न उभा राहिला, ज्याच्यासाठी भर मध्यरात्री पिळगांवकर दादरच्या ‘राम निवास’वर पोहचले आणि त्यांनी खालूनच हाका मारायला सुरुवात केली.

“अहो खेबुडकर. अहो खेबुडकर … “

जगदीश खेबुडकर राम निवासमध्ये राहत नव्हते. पण मुंबईत आले की त्यांचा मुक्काम रामनिवासवर असायचा हे पिळगांवकरांना माहिती होतं . आणि त्या रात्री खेबुड्कर मुंबईत आहेत हे पिळगावकरांना कळल्यावर ते थेट पोहोचलेच! पिळगावकरांना पाहून खेबुडकर खाली आले आणि चिंतेच्या सुरात विचारलं, “एवढ्या रात्री काय काम काढलंत?”

“गाडीत बसा. मग सांगतो”, पिळगांवकर म्हणाले. खेबुडकर आणखीच चिंतेत पडले.

“अष्टविनायकचं एक महत्वाचं गाणं आहे, आणि ते तुम्हीच करायचं.”

“पण अष्टविनायकची गाणी शांताबाई शेळकेंनी आणि शांताराम नांदगावकरांनी लिहिली आहेत ना? “

“हो, पण त्यांच्याच्यानं अष्टविनायकाचं गाणं होईना. ते तुम्हीच करणार ह्याची मला खात्री आहे.”

“अहो, पण मला अष्टविनायकांची काहीच माहिती नाही. मी त्यांपैकी एकही गणपती पाहिलेला नाही.”, खेबुडकरांनी त्यांची अडचण मांडली.

“त्याची काळजी करू नका.”, असं म्हणत पिळगावकरांनी अष्टविनायकांची महती आणि माहिती देणारी पुस्तिका त्यांच्या हातात ठेवली.

तोपर्यंत ते पिळगावकरांच्या घरी पोहोचले होते.

गाडीतून उतरता उतरता पिळगावकर म्हणाले, “खेबुडकर हे काम आज रात्रीच व्हायला हवे. उद्या रेकॉर्डिंग करायचं आहे. गणेश वर्णन लोक संगीताच्या बाजाचं करा म्हणजे झालं.”

एकेकाळी नमनाचं गाणं न ऐकलेल्या खेबुडकरांनी फक्कड लावणी लिहिली होती आणि ती गाजली पण होती. तेच खेबुडकर आता अष्टविनायकाचं गाणं लिहायला बसले होते ज्यांचं त्यांनी कधीच दर्शनही घेतलं नव्हतं. खेबुडकरांनी गणपतीचं स्मरण केलं. कागदावर श्रीकार टाकला आणि लिहायला सुरुवात केली.

कुडी झाली देऊळ छान काळजात सिंहासन

काळजात सिंहासन मधोमधी गजानन,

दोहीकडे रिद्धिसिद्धि उभ्या ललना,

अष्टविनायका तुझा महिमा कसा,

दर्शनाचा लाभ घ्यावा भक्तांनी असा,

अष्टविनायका तुझा महिमा कसा,

जय गणपती, गणपती गजवदना!!

बघता बघता एकेक गणपतीचं वैशिष्ट्य-विशेष सांगता सांगता ते आठव्या गणपतीपर्यंत येऊन पोहोचले.

पाली गावच्या बल्लाळेश्वरा,

आदिदेव तू बुद्धीसागरा,

स्वयंभू मूर्ती पूर्वाभिमूख,

सूर्यनारायण करी कौतुक,

डाव्या सोंडेचे रूप साजिरे,

कपाळ विशाळ डोळ्यांत हिरे,

चिरेबंद या भक्कम भिंती,

देवाच्या भक्तीला कशाची भीती,

ब्रम्हानंदी जीव होई वेडा की पिसा….

आणि ही महती लिहिता लिहिता सकाळ झाली होती. खेबुडकरांनी पेन खाली ठेवलं. पिळगांवकर त्याचीच वाट बघत होते. “आता चालीत म्हणून दाखवा.” ते म्हणाले आणि हे म्हणेपर्यंत अनिल-अरुणही येऊन पोहोचले.

सगळे प्रभादेवीच्या बाँबे साऊंड लॅबोरेटरीत पोहोचले. अनुराधा पौडवाल, चंद्रशेखर गाडगीळ, शरद जांभेकर, मनिष वाघमारे असे गायक आधीच येऊन बसले होते. ळगांवकर खेबुडकरांना म्हणाले, “आज गायकाची जबाबदारी पण तुम्हीच पार पाडायची …”

आणि खेबुडकरांनी खडा आवाज लावला. सातव्या गणपतीपासून सुरुवात केली.

महड गावाची महसूर, वरदविनायकाचं तिथं एक मंदिर..

मंदिर लई सादसूदं, जसं कौलारू घर..

घुमटाचा कळस सोनेरी, नक्षी नागाची कळसाच्यावर..

सपनात भक्ताला कळं, देवळाच्या मागं आहे तळं..

मूर्ती गणाची पाण्यात मिळं, त्यानी बांधलं तिथं देऊळ..

दगडी महिरप सिंहासनी या प्रसन्न मंगलमूर्ती हो,

वरदानाला विनायकाची पूजा कराया येती हो,

चतुर्थीला गर्दी होई रात्रंदिवसा!!

गाणं झकास झालं. तब्बल १३ मिनिटाचं गाणं!! आधी केलेलं शूट रद्द करून गाण्याचं पुन्हा चित्रीकरण करण्यात आलं. हा चित्रपटाचा क्लायमॅक्स होता आणि तो सुपरहिट झाला. चित्रपटाचा रौप्य महोत्सव झाला.

अष्टविनायकाचा महिमा आणखी दुमदुमतच राहीला!! अशी ही कहाणी एका रात्रीत निर्माणा झालेल्या गीताची!

संग्राहिका –  सौ. स्वाती रामचंद्र कोरे

खानापूर,जिल्हा सांगली

मो.9096818972

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ देशाची समृद्धी भारतीय रेल्वे – भाग -2 ☆ सौ. पुष्पा नंदकुमार प्रभुदेसाई

सौ. पुष्पा नंदकुमार प्रभुदेसाई

?  विविधा ?

☆ देशाची समृद्धी भारतीय रेल्वे – भाग -2 ☆ सौ. पुष्पा नंदकुमार प्रभुदेसाई ☆

(चरैवेति  चरैवेति)

[नागपूर येथून प्रसिद्ध होणा-या ‘राष्ट्रसेविका’ या अंकासाठी  सौ.पुष्पा प्रभू देसाई यांच्या भारतीय रेल्वेवरील लेखाची निवड झाली आहे. तो आपल्या वाचनासाठी चार भागात देत आहोत.]

भारतीय रेल्वेच्या उत्पादन संस्था केंद्रीय मंत्रालयाच्या अखत्यारित येतात१) डिझेल  लोकोमोटिव  कार्यशाळा.,–वाराणसी., २)चित्तरंजन  लोकोमोटिव कार्यशाळा–चित्तरंजन. ३) डिझेल लोको  अधुनिक कार्यशाळा–पतियाळा. ४)इंटिग्रल कोच फँक्टरी–चेन्नई. ५)रेल कोच फँक्टरी कपूरथळा.  ६)रेल व्हील फँक्टरी बंगळुरू.  ७)रेल स्प्रिंग  कारखाना — ग्वाल्हेर.

रेल्वेची  प्रशिक्षण केंद्रेही  अनेक  ठिकाणी  आहेत. १) इंडियन रेल्वे इन्स्टिट्यूट ऑफ मेकॅनिकल अँड इलेक्ट्रिकल इंजीनियरिंग– जमालपुर. २)रेल्वे स्टाफ कॉलेज –बडोदा। ३) इंडियन रेल्वे इन्स्टिट्यूट ऑफ सिग्नल इंजीनियरिंग अंड हेवी कम्युनिकेशन — सिकंदराबाद.  ४)इंडियन रेल्वे इन्स्टिट्यूट ऑफ सिव्हिल इंजिनिअरिंग –पुणे। ५)इंडियन रेल्वे इन्स्टिट्यूट ऑफ इलेक्ट्रिकल इंजीनियरिंग –नासिक. सेंटर फॉर रेल्वे इन्फर्मेशन सिस्टीम ही रेल्वे बोर्डाच्या नियंत्रणाखालील स्वतंत्र संस्था आहे. ती भारतीय रेल्वेसाठी संगणक प्रणालीचा विकास करते.

रेल्वे गाड्यांचे ही किती प्रकार सांगावेत१)उपनगरीय. २) एम.एम.यू. ३)डी. एम.यू.– डिझेल मल्टिपल युनिट. ४)डोंगरी. ५) पॅसेंजर  ६) एक्सप्रेस  ७)अतीजलद  ८) वातानुकूलित. ९) वातानुकुलीत सुपरफास्ट. १०) जनशताब्दी ११) शताब्दी. १२) संपर्क क्रांती. १३) गरीब रथ  १४) राजधानी. १५) दूरांतो. १६) दुमजली १७) अंत्योदय.  १८) उदय.  १९) तेजस .  २०) हमसफर . तसेच पॅलेस ऑन व्हील्स  ही विशेष गाडी राजस्थान सरकारने पर्यटन वाढवण्यासाठी सुरू केली भारत-पाकिस्तान दरम्यान समझोता एक्सप्रेस सुरू केली होती, पण आता की सुरू नाही. अपघाताच्या ठिकाणी लाईफ लाईन एक्सप्रेस काम करते. पुणे–नाशिक हाय स्पीड ला हिरवा कंदील दाखवण्यात आला आहे . मुंबई-दिल्ली मालगाडी साठी वेगळा मार्ग टाकणे चालू आहे. मुंबई– अहमदाबाद बुलेट ट्रेन चे काम चालू आहे. श्रीरामचंद्रांच्या स्थळांची तीर्थयात्रा करण्यासाठी, भारतीय रेल्वे “रामायण एक्सप्रेस ” सुरू करत आहे . सोळा रात्री आणि सोळा दिवस, प्रवास (१६०६५रु,.भाडे.).ए.सी.साठी (२६७७५ रु.). रेल्वेच्या वारसा यादीत अग्रणी असणाऱ्या आणि ९० वर्षे जुन्या असलेल्या, डेक्कन क्वीनचे मध्य रेल्वे आता रूप पालटणार आहे. जर्मन तंत्रज्ञान आधारित डबे, विशेष सुरक्षा व्यवस्था, आकर्षक बाह्यरूप, आरामदायी प्रवास, विशेष लोगो अशा सुधारणा आहेत.

भारतीय रेल्वेने प्रवाशांना गरजेप्रमाणे निरनिराळ्या वर्गांचे डबे केले आहेत.आरक्षित, द्वितीय, प्रथमवर्ग, खुर्चीयान, वातानुकूलित खुर्चीयांन, प्रथम आणि द्वितीय शयनयान, वगैरे. जोड मार्गिका वापरून, डबे एकमेकांना जोडले गेल्यामुळे, प्रवासी आतल्या आत एका डब्यातून दुसऱ्या डब्यात जाऊ शकतात.

क्रमशः….

©  सौ. पुष्पा नंदकुमार प्रभुदेसाई

बुधगावकर मळा रस्ता, मिरज.

मो. ९४०३५७०९८७

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares