मराठी साहित्य – विविधा ☆ मंथन ☆ सौ.ज्योत्स्ना तानवडे

सौ.ज्योत्स्ना तानवडे

 

 ☆ विविधा ☆ बदलता दृष्टीकोन ☆ सौ.ज्योत्स्ना तानवडे  ☆ 

ऐका सख्यांनो, ‘तिची’ कहाणी. ‘ती’ तुमचीच एक सखी. तिची कहाणी पण संसार, मुलं-बाळं, जिवलग, निसर्ग, कुटुंबाचे हीत, परमार्थ, व्रत,त्याग,साफल्य या भोवतीच फिरणारी.

तिचे माहेर छोट्याशा गावातले.  घरी धार्मिक,अध्यात्मिक, पारंपारिक, आधुनिक अशा सर्व विचारांचा मेळ. सर्व देवधर्म, पूजाअर्चा, परंपरा श्रद्धेने जपणारे आई-वडील. इतरांच्या मदतीला धावणारे, सर्वांच्या उपयोगी पडणारे, गावाचा आधारस्तंभ होते. धार्मिक व्रतवैकल्यांबरोबर सामाजिक व्रताचा वसा तिला त्यांच्याकडूनच मिळाला. वारीची परंपरा, त्यातले मर्म समजले.

लग्नानंतर ती मोठ्या शहरात, मोठ्या गोतावळ्यात गेली. तिथले वातावरणही पूर्ण श्रद्धाळू, धार्मिक. तिच्या सासूबाई त्या काळाप्रमाणे कमी शिकलेल्या, सण-वार,परंपरांच्या धबडग्यातल्याच.पण तरीही अतिशय प्रगल्भ विचारसरणी असलेल्या. असंख्य पुस्तकांच्या वाचनाने विचारात, आचारात काळानुरूप बदल केलेल्या. जुन्या कालबाह्य गोष्टी त्यांनीच सोडून दिलेल्या होत्या. त्यामुळे सुनांना त्यांनी कसलीच बंधने कधी घातली नाहीत. ती घरात सर्वात लहान. त्यामुळे सासूबाई नंतर कुळधर्म मोठ्या घरी सुरू झाले. सर्वांनी आपापल्या घरी करण्याऐवजी एका घरी करताना सर्वांनी एकमेकांकडे जाणे, या निमित्ताने नाती जपणे हे तिने कटाक्षाने पाळले. घरामध्ये, नातलगांमध्ये मिळून-मिसळून, सर्वांना धरून राहण्याचे व्रत ती अखंडपणे जपते आहे. या व्रतवैकल्यांचा अंतिम उद्देशच सर्वांचे हित,कल्याण हा आहे. ‘एकमेकां सहाय्य करू अवघे धरू सुपंथ’ हे खरे आहे.

तिने पुढच्या पिढीला श्रद्धा जपायला शिकवले आहे. प्रथेचे अवडंबर न करता काळानुसार जे शक्य आहे ते मनोभावे करा. माणसातला, स्वत:च्या मनातला देव जपा. त्याच्याशी प्रामाणिक राहा. तो सदैव पाठराखण करतो हेच मनी बिंबवले आहे.

सण उत्सव, व्रतवैकल्ये हवीत. नियम, बंधने, संयम अवश्य हवा. पण या सर्वांसाठी निसर्गाला हानी पोहोचवू नये असे तिचे ठाम मत आहे. फुलं- पानं, फांद्या हव्यात म्हणून झाडांना ओरबाडायचे, निर्माल्य नदीत सोडायच्या निमित्ताने सगळा कचरा, घातक रंगांच्या प्लॅस्टरच्या मूर्ती पाण्यात सोडून जलप्रदूषण करायचे, उत्सवाच्या नावाखाली ध्वनिप्रदूषण करायचे ही कसली आलीय श्रद्धा ? यामुळे उत्सवांच्या मूळ उद्देशालाच दूर सारले जाते ही गोष्ट सर्वांनी लक्षात घ्यायला हवी. उत्सवाच्या निमित्ताने आत्मपरीक्षण करायला हवे असे तिला वाटते.

या सणावारांना ऋतू बदलानुसार योग्य खाद्य पदार्थ प्रसाद म्हणून केले जातात. ही गोष्ट आहारशास्त्राशी निगडित आहे. ती निश्चितपणे पाळावी. चातुर्मासाच्या निमित्ताने अनेक नेम धरले जातात. जे आरोग्यास योग्य ते अवश्य करावे. पण या जोडीला आणखी काही नवीन नेम धरता येतील. जास्ती समाजाभिमुख होऊन काही वेगळे संकल्प करावेत असे तिला वाटते.

असे उपक्रम म्हणजे — हॉस्पिटलमधील अॅडमिट पेशंटना भेटणे.एखादे फूल, फळ देऊन ‘लवकर बरे व्हा’ सांगत मानसिक उभारी देणे.

अनाथाश्रम, वृद्धाश्रमातील लोकांना भेटणे.त्यांना चांगली गाणी, गोष्टी ऐकवून मनमोकळ्या गप्पा मारणे.

शाळा-शाळांतील मुलांना चांगली गाणी, गोष्टी, कथा ऐकवणे. त्यांचे वेगवेगळे खेळ घेणे.

घराबाहेर पडू न शकणार्‍या ज्येष्ठांना आवर्जून जाऊन भेटणे.

दर आठवड्याला एका नातेवाईकाला जाऊन निवांतपणे भेटणे.जवळीक वाढवणे.

सर्वांनी मिळून देऊळ, बागा अशा सार्वजनिक ठिकाणांची स्वच्छता करणे.

झाडे लावून ती काळजीपूर्वक वाढवणे. यासारख्या कितीतरी उपयोगी गोष्टी करता येतील.

“मनी वसो रामनाम, हात करो पुण्यकर्म” हेच तर ब्रीद असावे.  पुढच्या पिढीला पण अशा विचारांची दीक्षा देऊन त्यांना या कामात सहभागी करून घ्यायला हवे. ज्याला ज्या मार्गाने जमते त्या मार्गाने त्याने समाजसेवा करावी.

तिने समाजसेवेचा वसा आई-वडिलांकडून घेतला आहे. तो ती वेगवेगळ्या मार्गाने अमलात आणते. आपण ‘समाजाचे देणे’ लागतो ते फेडायचा ती यथाशक्ती प्रयत्न करते. शेवटी समाज म्हणजे कोण?  तुम्ही आम्हीच ना! म्हणून या चांगल्या कामांची स्वतःपासून सुरुवात करायला हवी असे तिचे मत आहे.

तिला ‘खुलभर दुधाची’ कहाणी फार आवडते. प्रत्येकाने आपल्या श्रद्धा जपत उत्सवाच्या निमित्ताने थोडा थोडा हातभार लावला तर समाज प्रबोधन, समाजरक्षण, पर्यावरण रक्षण यांचा हा गोवर्धन निश्चितपणे उचलला जाईल.

तेव्हा मैत्रिणींनो आनंदात समाधानात सण साजरे करूयात.धन्यवाद.

 

© सौ. ज्योत्स्ना तानवडे

वारजे, पुणे.५८

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – क्षण सृजनचा ☆ सरींवर  सरी (कवितेची  जन्मकथा) ☆ सौ. दीपा नारायण पुजारी

 ☆ क्षण सृजनचा ☆ सरींवर  सरी (कवितेची  जन्मकथा) ☆ सौ. दीपा नारायण पुजारी  ☆ 

जून  महिन्यातील  असाच  एक  दिवस. संध्याकाळचे  चार वाजून गेले असावेत . आज सकाळपासूनच  आभाळ जड  झालयं. काळंभोर, घनबावरं झालयं. कोसळू पाहतंय  पण  कोसळत नाहीय. इथं , कोईमतूर मध्ये मी घरी एकटीच . मुलगा  आणि  सून  ऑफिसला गेलेत. नातूही दुपारचा झोपलाय . खिडकीतून दिसणारे काळे जडावलेले ढग बघत बसलेय मी . मोरही अगदी  सहज  फिरताना दिसतात या बाजूला . त्यानंही केकारव केला . अरे! हा तर थिरकू लागला !! बघता बघता पावसाचे टपोरे टपोरे  थेंब येऊ  लागले . थेंबांच्या सरी झाल्या . धो धो कोसळू लागल्या . मन  तर बालपणीच्या  अंगणात  जाऊन गारा  वेचून आलं . . . . परकरपोलक्यातून केंव्हाच सटकलं . . . मैत्रिणींच्या बरोबर नाचू लागलं. . .

सरींवर सरी कोसळू लागतात

आठवणींचे मोती सरीत गुंततात

अगबाई . . लग्नंही  जूनमधलचं. . त्याही दिवशी असाच  पाऊस . . .  आता सरींचे  हिंदोळे झाले . चांदणफुलांनी त्याची माझी ओंजळ  भरली. . . थांब, थांब ना जरा. . .

अंबरातून सावळघन बरसताहेत

मनजलधित तरंग उठताहेत

आता अनेक आठवणी, अनेक साठवणी. . .

उडून गेलेली छत्री, झालेली फजिती. .

ऊटीच्या थंडीतही पावसात भिजत खाल्लेलं आईस्क्रीम. . . .

आठवणींचे तरंगावर तरंग. पाण्यात दगड टाकल्यावर ऊठावेत तसे.

मनाच्या डोहात किती वलयं उठतायत. एकात एक, पुन्हा त्यात एक.. . एकाच केंद्राभोवती. . . की. . की प्रत्येकाचा केंद्र बिंदू निराळा? माझं मन हे केंद्र बिंदू प्रमाणं समजलं तर समकेंद्री . पण असंख्य जीवनाभुवानं वेगवेगळ्या क्षणी मला बहाल केलेल्या स्मृती . . विकेंद्री!!

आठवणी काही आनंदाच्या,  काही माझ्याच जीवनवेलीवरील फुलांनी दिलेल्या समाधानाच्या. .

हे काय सरीतील मोती अजूनही ओघळतच आहेत. . . . स्वैर. . . . बेबंद. . . आणि हा वेडापिसा झालेला मोर तर , मान उंचावून; निळाभोर होऊन; आनंदघनात चिंब झालाय.

. . . . . . मी ही एक गिरकी घेतली. मीच मला टाळी दिली. गदिमांच्या थुई थुई नाचणारा निळा सवंगडी मनाच्या अंगणात पदन्यास करु लागला.. . . . .

तशी मी बाथरूम सिंगरही नाही. पण आज या आठवणींच्या सुरावटीनं माझं गाणं ही सुरेल झालंय. माझ्या नकळत माझ्या चेहऱ्यावर उठणारे तरंग आजूबाजूला ऊबदार, सुखद तशाच ‘Positive vibes’ पसरवताहेत. . . . माझं आनंदगान घननील  नभापर्यंत उंच उंच झेपावतय.

सरींवर सरी

सरींवर सरी कोसळत  राहतात,

आठवणींचे मोती सरीत गुंततात,

सरींचे हिंदोळे अंबरी झुलतात,

चांदणफुले वेचून मने डोलतात,

अंबरातले सावळ घन बरसतात

मनजलधित तरंग ऊठतात,

तरंगांची वलये तनमनात झरतात,

वलयांची कंपने झंकारतात,

सरींचा ताल पकडून,

थेंबांचा ठेका धरून,

हिंदोळ्यांच्या लयीत,

आठवणींच्या सरीतील थेंबांचे मोती,

स्वैर बेबंद ओघळत राहतात __. . . . . .

मनमोरही आता धरतो ताल

ऐटीत लहरते एक अल्लड चाल

केकावलीची तानही थिरकते सुरेल

सरींची लकेर घेऊन मनगीत भिजते सचैल !!!!

© सौ. दीपा नारायण पुजारी

इचलकरंजी

? – 9665669148

deepapujari57@gmail.com

ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ आविष्कार एका सृजनाचा ☆ सुश्री स्नेहा विनायक दामले

 ☆ विविधा ☆ आविष्कार एका सृजनाचा ☆ सुश्री स्नेहा विनायक दामले ☆ 

आविष्कार एका सृजनाचा

छान किती दिसते फुलपाखरू

मी धरु जाता येई न आता…. फुलपाखराचं असं यथार्थ वर्णन एका कवितेत केलेलं आहे. रंगीत फुलपाखरांची दुनिया मोठी अजब असते. काही दिवसांचे छोटेसे आयुष्य असणारी फुलपाखरं जन्म घेतात ती एकदम मोठी होऊनच! इतर प्राण्यांसारखा ‘बालपण’ हा टप्पाच नसतो त्यांच्या आयुष्यात; आणि या कीटकवर्गी जीवाचा जन्म सुद्धा अगदी वैशिष्ट्यपूर्ण रीतीने होतो. अंडी-अंड्यातून अळी-अळीचा कोष आणि कोषातून फुलपाखरू असा तो प्रवास! मागे एकदा एका फुलपाखरू उद्यानात फुलपाखराच्या या जीवनावस्था जवळून प्रत्यक्ष पाहता आल्या होत्या. झाडांची कुरतडलेली, अर्धवट खाल्लेली पानं ही बरेचदा फुलपाखराच्या अळीचा प्रताप असतो हेही तेव्हा कळलं होतं. तेव्हापासून अशी पानं पाहिली की ही कोणत्या बरं फुलपाखराच्या अळीने खाल्ली असतील या विचाराने कुतूहल जागृत होऊ लागले..  भविष्यात एका सुंदर फुलपाखराला जन्म देण्यासाठी झाडाची पानं विद्रूप करणाऱ्या अळीला पानावरून झटकून टाकण्याची भावना नाहीशी झाली.. असो..

गवतावर बागडणारी पिवळी फुलपाखरे प्रत्येकाने पाहिली असतील. ‘ग्रास यलो’ फुलपाखरे म्हणतात त्यांना. यातही बरेच प्रकार आहेत. याच प्रकारच्या एका फुलपाखराच्या जन्माची ही गोड कहाणी….

माझ्या घरातल्या कुंडीतील शिरीषाच्या रोपावर एक दिवस तीन चार हिरव्यागार उदबत्तीच्या पातळ काडी सारख्या जेमतेम एक सेंटीमीटर लांबीच्या अळ्या दिसल्या. जेमतेम अर्धा फूट उंचीचे ते रोप आणि त्याला चार-पाच चिंचेच्या पानासारखी संयुक्त पानं, छोटी छोट पर्णदलं असणारी.. या एवढ्याच विश्वात या अळ्या दोन-चार दिवस मनसोक्त हुंदडत होत्या; बाजूच्या इतर झाडांकडे ढुंकूनही पाहत नव्हत्या. त्या इटुकल्या झाडाच्या पानांचा फडशा पाडत होत्या आणि दिवसागणिक लठ्ठ होत होत्या. ‘खादाड’ हाच शब्द अगदी बरोबर लागू पडतो त्यांना. मी वाट बघत होते आता पुढे काय होणार? ही अळी कोष कुठे बनवणार? रोज सकाळी उठल्यावर आधी झाडाचे निरीक्षण करत होते. एके दिवशी पाहिलं तर एकही अळी दिसेना! म्हटलं कोष बनवायला दुसरीकडे गेल्या की काय? म्हणून आजूबाजूची झाडं न्याहाळू लागले पण काsही दिसेना.. मग पुन्हा शिरीषाच्या रोपाचंच पान अन् पान बारकाईने पाहू लागले; आणि काय? अगदी पानासारखे दिसणारे, पानाच्या आकाराचे दोन हिरवे कोश मला दिसले आणि एका हिरव्या देठाला बिलगून असलेली एक लठ्ठ अळी, हालचाल न करता अगदी निपचीत पडून असलेली; पटकन दिसणारच नाही अशी! तिच्याकडे पहात मी तशीच उभी राहिले अन् तेवढ्यात अळीची जोरदार हालचाल सुरू झाली!! अळीच्या  शरीराचे एक टोक देठाला चिकटून राहिले आणि दुसरे टोक  अधांतरी लोंबकळत; त्यातून भराभर स्त्राव पाझरू लागला आणि त्यात अळी गुरफटली जाऊ लागली. वीस-पंचवीस सेकंदांचा खेळ!! अळी ‘अळी’ राहिलीच नाही, त्या ठिकाणी हिरव्या रंगाचा त्रिकोणी आकार दिसू लागला. त्रिकोणाचे अधांतरी टोक तेवढ्यात वर देठाकडे सरसावले आणि पुन्हा खाली आले. पाहते तर काय? एका बारीक धाग्याने आता ते टोकही देठाला जोडले गेले होते! विस्फारलेल्या नजरेने मी हा सगळा प्रकार पाहत होते. अगदी अद्भुत!!! हुबेहूब पानासारखा दिसणारा तिसरा कोष आता त्या इवल्याशा रोपावर लटकत होता; खादाड अळी कोषात बंदिस्त झाली होती….

आता रोज मी त्या कोषाचे निरीक्षण करू लागले. चार दिवस उलटले. प्रत्येक दिवसागणिक कोषाचा रंग पालटताना दिसत होता. हिरवा कोष सुरुवातीला पिवळसर होत गडद पिवळा झाला. आणखी एक-दोन दिवसांनी त्या पिवळ्या कोषात काळी कडा उमटलेली दिसली. मी निरखून पाहत होते काही हालचाल दिसते का ते आणि माझे अहोभाग्य की निसर्गाच्या सृजनाचा एक मनमोहक आविष्कार माझ्या डोळ्यासमोर साजरा झाला. एका क्षणात या कोषाच्या, धाग्याने जोडलेल्या टोकातून पिवळी पिवळी लड खाली घरंगळली. रेशमी कापडासारख्या त्या पिवळ्या गुंडाळीतून ताबडतोब दोन काळ्या अँटिना(स्पृशा) उंचावल्या आणि आणि दोन इवल्या पायांची पकड कोषावर घट्ट बसली. पिवळा अपारदर्शी कोष आता रिकामा होऊन पारदर्शक झाला. पिवळी गुंडाळी आता हळूहळू मोकळी होऊ लागली आणि काही सेकंदात काळ्या किनारीचे ठिपकेदार पिवळे पंख पसरले गेले. आपल्या पायांच्या तीन जोड्यांच्या आधाराने कोषाला बिलगलेले, पूर्ण वाढ झालेले ग्रास यलो फुलपाखरू या जगात अवतरले होते.

अर्ध्या-एक मिनिटात घडलेले हे अद्भुत पाहून मी आनंदाने ओरडायचीच बाकी होते. एक बाय अर्धा सेंटीमीटर आकाराच्या कोषातून चांगले तीन सेंटीमीटर लांब पंख असलेले फुलपाखरू बाहेर आले होते. जवळ जवळ तासभर ते तसेच रिकाम्या कोषात पाय रोवून होते; अधून-मधून पंखांची उघडझाप करत होते. एका क्षणी ते झटकन कोष सोडून उडून गेले आणि दूर पसार झाले…

दिवाळीच्या मुहूर्तावर अशाप्रकारे दोन सुंदर जीवांचा आमच्या घरी जन्म झाला होता, दिवाळीचा आनंद त्यांनी दशगुणित केला होता.

 

© सुश्री स्नेहा विनायक दामले

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ माझी वाटचाल…. मी अजून लढते आहे – 3 ☆ सुश्री शिल्पा मैंदर्गी

सुश्री शिल्पा मैंदर्गी

☆ मनमंजुषेतून ☆ माझी वाटचाल…. मी अजून लढते आहे –3 ☆ सुश्री शिल्पा मैंदर्गी ☆ 

(पूर्ण अंध असूनही अतिशय उत्साही. साहित्य लेखन तिच्या सांगण्यावरून लिखीत स्वरूपात सौ.अंजली गोखले यांनी ई-अभिव्यक्ती साठी सादर केले आहे.)

माझे कॉलेजला जाणे माझ्यासाठी अनेक प्रकारे आव्हानात्मक होते.  मी एकटी जाऊ शकत नव्हते.  कोणीतरी मैत्रिण बरोबर असेल तरच नियमीत घडे.  समजा कोणी आली नाही, तर वाट पहाण्याशिवाय मी काही

च करू शकत नसे.  मात्र माझी ही अडचण बाबांनी ओळखली आणि उशीर होतोय हे लक्षात आल्यावर ते मला लुनावरून कॉलेज पर्यंत सोडायला यायचे, वर्गापर्यंत सोडायची त्यांची तयारी असायची, पण मी दिसले की कॉलेज मधली कुठलीही मैत्रिण, ओळख असो वा नसो, मला हात द्यायला यायची.  त्यामुळे सगळ्याच माझ्या मैत्रिणी झाल्या होत्या.

शाळे मध्ये माझ्या बाबांचे माझ्यावर protective कवच होते.  सगळेजण सरांची मुलगी म्हणूनच मला ओळखत होते.  मात्र कॉलेज मध्ये आल्यावर घरट्यातून पक्षी कसा भरारी मारतो, तसे मी माझ्या पंखांनी भरारी मारते आहे असेच मला वाटले.  सगळे नवीन , मैत्रिणी नवीन, प्राध्यापक नवीन, वातावरण नवीन.  सुखातीला फार बावचळल्यासारखे झाले, पण नंतर मीच जुळवून घ्यायला सुरवात केली.  प्राध्यापक जे  बोलतात, शिकवतात ते लक्षपूर्वक ऐकायचे, ते सांगतील ते आणि तसेच करायचे हे मी पक्के ठरवले. .

१२वीच्या बोर्डाच्या परीक्षेला थोडे tension आले होते.  रायटर ची मदत घ्यायची हेतर नक्की हेतेच.  माझ्यासाठी एक वर्ग रिकामा ठेवला होता.  मी आणि माझी रायटर एका बाकावर आणि सुपरवायझर मागच्या बाकावर बसल्या होत्या.  त्यांनी त्यांचे काम चोख बजावले.  रायटर कडे पुस्तक, कागद नाही ना, हे त्यांनी तपासले.  त्यावेळी थोडे दडपण आले, पण माझा अभ्यास व्यवस्थित तयार होता.  एक वेगळा अनुभव मिळाला आणि मला १२वी आर्टस ला ६१% मार्क्स मिळाले.

FY B.  A.  चे वर्ष सुरळीत पार पडले.  पण SY मध्ये माझ्या दोन्ही बहिणींची पाठोपाठ लग्ने झाली.  त्यामुळे घरी मला वाचून दाखवणे कमी झाले आणि त्याचा व्हायचा तो परिणाम झाला.  मला A T K T मिळाली, माझा English विषय राहिला.  मला फार वाईट वाटले.  पण बाबानी धीर दिला.. ” अग, एवढे काय त्यात ? ऑक्टोबर ला सोडव”.  त्यांनी माझा अभ्यास घेतला.  पुनः रायटर शोधायला पाहिजे होती.  माझ्या वर्गात अमीना सार वान नावाची मुलगी होती.  ती मला खूप मदत करायची.  तिच्या हाताला पोलीओ झाला होता.  त्यामुळे स ह वेदना ती जाणायची.  मला चांगला राइटर पाहिजे आहे हे समजल्यावर तिने तिच्या लहान बहिणीशी माझी ओळख करून दिली. समीना,बारावी मध्ये होती.ती तयार झाली.रोज संध्याकाळी सहा वाजता,प्रॅक्टिस म्हणूनजुने पेपर्स आम्ही सोडवले.समीना नं खूप छान काम केलं,पेपर मध्ये स्पेलिंग मिस्टेक्स केल्या नाहीत,मी सांगितलं तसं तिनं लिहिलं आणि आश्चर्य म्हणजे मला शंभर पैकी अष्टयाहत्तर मार्क्स मिळाले.

अभ्यासाबरोबरच कॉलेजमध्ये मी वक्तृत्व स्पर्धेत आणि गॅदरिंग मध्येही भाग घेतला. अकरावीमध्ये सायोनारा हा डान्स प्रतिमान माझा बस वला. डान्स ची सगळे ड्रेपरी पांढरी मॅक्सि,ओढणी,पंखा सगळं सगळं सांगली मधुन आणलं होतं.डान्स खूप छान झाला.सगळ्या मुलींनी डोक्यावर घेतलं.माझा डान्स संपल्यावर”यही है राईट  चॉईस बेबी”असा ठेका धरला होता घोषणा देत होत्या. ते मला अजूनही छान आठवते. माझे वक्तृत्व चांगले असल्यामुळे मैत्रिणी माझ्याकडून गाईडन्स घ्यायच्या. मी पण त्यांना मला जे येत असे ते बिनदिक्कत सांगत असे. आमच्यामध्ये निरोगी.  कॉम्पिटिशन होती.

मी कॉलेजमध्ये रमले होते. खूप मैत्रिणी मिळाल्या,सगळ्या प्राध्यापकांची ओळख झाली,अडचण अशी काही आली नाही.सगळ्यांनी मला समजून घेतलं आणि मी सुद्धा माझ्यापरी नं सांभाळून घेतलं.

…. क्रमशः

© सुश्री शिल्पा मैंदर्गी

दूरभाष ०२३३ २२२५२७५

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ माझ्या डायरीतले एक पान ☆ सुश्री संगीता कुलकर्णी 

सुश्री संगीता कुलकर्णी

☆ विविधा ☆ माझ्या डायरीतले एक पान ☆ सुश्री संगीता कुलकर्णी ☆ 

सकाळची वेळ…टि.व्ही वर लागलेली जुनी गाणी …बाहेर सुटलेला वारा

वादळाची चाहूल देणारा..पण मन मात्र बैचेन घुसमटलेले..मनात विचारांचे वादळ घोंघावत होते. मनातले विचारांचे हे वादळ काही शमत नव्हते. तेवढ्यात हवेच्या झोक्यानी एक पान माझ्या पायाशी येऊन पडले. ते मी उचलून हातात घेतले. अरे !! हे तर माझ्या डायरीतले एक पान….

मान उंचावून बघितले तर समोरच्या टेबलावरच्या माझ्या डायरीतली पाने वा-याने फडफडीत होती त्यातलेच हे एक पान निसटून माझ्या पायाशी येऊन पडले होते..

कळत-नकळत… त्यातल्या दोन ओळी नजरेत पडल्या…जणू काही देवानेच माझ्या मनातले हे वादळ शमवण्याकरता ते पान माझ्या पायाशी पाडले असावे असे मला मनोमन वाटले…

माझे मन जरा स्थिरावत असतानाच माझ्या मनाने पुन्हा अनपेक्षित असे वळण घेतले व नव्या वाटेची साद घातली….पण हे अनपेक्षित वळण मात्रं माझ्या आयुष्यात” ओंजळीतले सोनेरी क्षण” बनून आले. तेच मी आता तुमच्या समोर उलगडते….

प्रत्येक दिवस हा उगवत असतो तसा तो मावळतही असतो. क्षणोक्षणी आपले वय कमी न होता वाढतच जाते. कितीतरी माणसे जन्माला येतात व मृत्यूही पावतात. पण असे कितीतरी लोक आपल्या मृत्यूला हुलकावणी देऊन परत मागे फिरतात आपले उरलेले आयुष्य व्यतित करण्यासाठी…आयुष्य म्हणजे काय? आपला जन्म कशासाठी झाला आहे? आपण काय करतो?आपले जीवन खरचं काय आहे? असे प्रश्न मनात सतत येत होते पण त्याचे उत्तर काही सापडत नव्हते.याचा सतत विचार करता करता मला त्याचे उत्तर मिळाले..

आयुष्य म्हणजे ” जीवनातील सोनेरी क्षण ” हे ओंजळीत भरून जगण्यासाठी आहे. सुंदर, आनंदी, निरागस जीवन जगण्यासाठी आहेत. आपले जीवन काय आहे? हे ख-या अर्थाने समजून घेण्यासाठी आहेत. जीवन हा एक अनंत सुखाचा झरा आहे. या सुखाला झुल्यावर बसून आपण आनंदाने त्यावर बसून झुलण्यासाठी आहे. तसेच जीवनगीत गाण्यासाठीही आहेत…

प्रत्येकाच्या जीवनात सुख, दुःख, वेदना, नशीबाचा निर्णय, चुकीचा निर्णय, सत्यता अशा अनेक गोष्टी येतच असतात पण त्यातून आपण शहाणं होणं अत्यंत आवश्यक असतं.

स्वतःमध्ये भावतरंगाचे अनेक पैलू असतात ते आपण स्वतः उलगडून पाहिले पाहिजे. त्यांचा अभ्यास केला पाहिजे. तसचं योग्य तो विचार- विनिमय सुद्धा केला पाहिजे.

“जीवन ही एक उदात्त उर्जा आहे व ती ईश्वराने आपल्याला दिलेली एक अमूल्य अशी देणगी आहे.”  असे मला विचाराअंती पटले. ते मी माझ्या मनावर पूर्णपणे बिंबविले व स्वतःमध्ये लगेचच अमुलाग्र बदल घडवायला लागले..

बुद्धिमत्तेच्या जोरावर जगाला दिसेल असं आपलं कर्तृत्व सिद्ध केले पाहिजे. आपण आपल्याला योग्य माणूस म्हणून घडविले पाहिजे. एक चैतन्य मूर्तीही बनलं पाहिजे. दुस-यांना मदत करण्यासाठी सदैव तप्तर ही रहायला पाहिजे. हे सर्व करत असताना आपल्या वैयक्तिक कटकटींना तिलांजली दिली पाहिजे. हे मी सर्व लक्षात ठेवले.

माझ्याशिवाय यांच्यावर प्रेम करणारं दुसरं-तिसरं कुणीही नसून फक्त मीच त्यांची आहे. मला त्यांना भरभरून सुख आनंद समाधान द्यायचा आहे. त्यांच्या चेह-यावर निरागस हास्य फुलवायचे आहे. असा विचार मी माझ्या मनावर पूर्णपणे ठसवला व या कामाला मी लगेचच सुरूवातही केली.. “ओंजळीतले सोनेरी क्षण ” मला सुखद अनुभवता आले. मनाला अतिशय आनंद झाला. या सर्व गोष्टी करत असताना मी माझं मन मात्रं निःस्वार्थी ठेवलं. फळाची अपेक्षा न करता सदैव मदतीचा हात पुढे केला. सगळ्यांशी प्रेमाने वागले -बोलले ..

थोरामोठ्यांचा सन्मान केला. आपण ज्या समाजात राहतो त्या समाजाचे आपण काही देणे लागतो आपण ते त्यांना दिले पाहिजे हे लक्षात ठेऊन निःस्वार्थी भावनेने समाजकार्य केले. दुस-यांना आनंद कसा देता येईल याचा सुद्धा विचार केला..

खरचं किती साध्या सोप्या या गोष्टी आहेत. आपल्या जवळ असून सुद्धा आपल्याला त्या कळत नसतात. पण मला त्या कळल्या म्हणून मी देवाचे मनोमन आभार मानले..

खरोखरचं एका अनपेक्षित वळणाने माझं आख्खं आयुष्याचं बदलून टाकलं…चेह-यावर आपोआपच हसू तरळलं…

किती वेळ गेला कुणास ठाऊक ?  मी  तंद्रीतून बाहेर आले व मनातल्या मनात खुदकन् हसत माझ्या कामाला लागले…

 

©  सुश्री संगीता कुलकर्णी 

9870451020

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ शशीबिंब उतरले धरेवरी ☆ सौ. उज्वला सहस्त्रबुद्धे

☆ विविधा ☆ शशीबिंब उतरले धरेवरी ☆ सौ. उज्वला सहस्त्रबुद्धे

शारदीय नवरात्रानंतर  येणारी ही शरद ऋतूतील पौर्णिमा ही सर्व पौर्णिमांचा जणू हिरेजडित मुकुट आहे! पावसाचे चार महिने संपल्यानंतर शरदाचे सुखद चांदणे आणि पूर्ण चंद्रासह ही पौर्णिमा येते तेव्हा सर्वांच्याच मनात नवचैतन्याचे वारे वाहू लागतात. पौर्णिमेचा चंद्र बघता बघताच मनातले की तसं तर प्रत्येक मराठी महिन्यात येणारी पौर्णिमा ही नवीन काहीतरी घेऊन येते आणि असा विचार मनात येताच माझे मन चैत्री पौर्णिमे कडे वळले.

चैत्र महिन्यात येणारी पौर्णिमा हा हनुमंताचा जन्मदिन आहे. बुद्धीमंत, शक्तिमान असा मारुती चैत्री पौर्णिमेला उगवत्या सूर्या बरोबरच जन्म घेतो आणि आपल्याला शक्तीची उपासना करण्यात प्रवृत्त करतो. चैत्रा नंतर वैशाखात सूर्याचे तापमान वाढू लागते आणि उन्हाचा चटका बसू लागतो. अशावेळी येणारी वैशाखी पौर्णिमा उत्तरेत पंजाब, दिल्ली या सारख्या भागात बैसाखी म्हणून साजरी होते. निसर्गात मिळणारी लिंबू ,कलिंगड, खरबूज यासारखी फळे व त्यांचे रस इथे मुबलक प्रमाणात वापरतात.

त्यानंतर येणारी ज्येष्ठ पौर्णिमा आपल्याला निसर्गाकडे नेते. पावसाची सुरुवात होऊन सृष्टी हिरवीगार होण्याचा हा काळ! या दिवशी स्त्रियांच्या वडपोर्णिमा व्रताचे नाते आपल्याला निसर्गाशी एकरूप होण्यास शिकवते !

आषाढी पौर्णिमा गुरुपौर्णिमा म्हणून साजरी केली जाते. आई ,गुरुजन, ग्रंथ असो वा निसर्ग आपल्या गुरुस्थानी असणाऱ्या प्रत्येका प्रती आपला कृतज्ञ भाव व्यक्त करणारी ही आषाढातील पौर्णिमा! कधीकधी चंद्राचे दर्शनही होत नाही या पौर्णिमेला! तरीही ही पौर्णिमा आपल्या मनाला एका वेगळ्या भावविश्वात घेऊन जाते.

श्रावणात येणार्या नारळी पौर्णिमेपासून पाऊस हळूहळू कमी होऊ लागतो. खवळलेला समुद्र शांत होऊन समुद्रावर कोळी लोकांना आपले व्यवहार करता यावे ,यासाठी समुद्राला नारळ अर्पण करून आपण आपली कृतज्ञता व्यक्त करतो!

भाद्रपदात येणारे गौरी गणपतीचे सण साजरे करून येणारी भाद्रपद पौर्णिमा ही पुढे महालया चे दिवस सुरु करते.आपल्या पूर्वजांचे स्मरण या काळात केले जाते.

या काळात पाऊस कमी होऊन पिके, भाजीपाला याची नवनिर्मिती दिसू लागते.

अश्विन महिन्यातील कोजागिरी पौर्णिमा ही सर्व पौर्णिमांचा मुकुट मणी वाटतो मला! पाऊस संपल्याने सारी सृष्टी हिरवेगार झालेली! दिवाळीसारखा सण तोंडावर आल्याने सगळीकडे उत्साह भरलेला! आकाश निरभ्र होऊन चांदण्यांनी भरलेले तर त्यांचा सखा चंद्र,त्याच्या   शांत, स्निग्ध प्रकाशाने सृष्टीला सौख्य देणारा! या दिवशी चंद्राला दुधाचा नैवेद्य दाखवून आपण जागरण करतो. या पौर्णिमेला नवान्न पौर्णिमा असेही म्हणतात. कारण नवीन भात आले असल्याने पौर्णिमेला खिरीचा नैवेद्य केला जातो.

कार्तिक पौर्णिमा म्हणजे त्रिपुरी पौर्णिमा! संध्याकाळच्या शांत वातावरणात त्रिपुर लावून त्याची शोभा पहाण्याचा आनंद वेगळाच! त्रिपुरासुराचा वध केला तो हा दिवस म्हणून त्रिपुरी पौर्णिमेचे महत्व!

आल्हाददायक वातावरणात येणारी मार्गशीर्ष  पौर्णिमा! या पौर्णिमेचा चंद्र आकाराने थोडा मोठाच वाटतो. हळूहळू दिवस मोठा होत जाणार आणि रात्र लहान याची जाणीव करून देणारा! सर्व सृष्टीचे तारणहार ब्रह्मा, विष्णू आणि महेश यांचा दत्तावतार मार्गशीर्ष पौर्णिमेला होतो.

माघी   पौर्णिमेचे  वैशिष्ट्य जाणवते ते माघ स्नानात! या काळात, तीर्थक्षेत्री नद्यांच्या काठी मोठे मोठे मेळे भरतात आणि लोक पवित्र नदी स्नानाचा आनंद घेतात!

अशा तऱ्हेने वर्ष संपत येते आणि फाल्गुन पौर्णिमा येते.  सर्व वाईट गोष्टींचे अग्नि समर्पण करून चांगल्याचा उदय व्हावा म्हणून होळी पेटवली जाते!

यानंतर आपण पुन्हा नवीन वर्षाचे स्वागत करायला सज्ज होतो.

हिंदू संस्कृतीत निसर्गातील पंचमहाभूतांचा संबंध आपण सणांशी जोडला आहे. पृथ्वी ,आप, तेज, वायु ,.आकाश या सर्वांशी निगडीत असे आपले सण वार आहेत. पौर्णिमा हे भरतीचे प्रतीक आहे.कोणताही आनंद हा पौर्णिमेच्या चंद्रासारखा भरभरून घेता आला पाहिजे! भरतीनंतर ओहोटी हा निसर्ग नियमच आहे. जसे पौर्णिमेनंतर पंधरा दिवसांनी येणारी अमावस्या! अमावस्या नंतर दुसऱ्याच दिवसापासून कलेकलेने चंद्रकला वाढताना आपल्याला दिसते. मनावर आलेली अमावस्येची काजळी दूर होत होत होत पौर्णिमे कडे वाटचाल चालू होते. आपलं जीवन हे असंच असतं!सुखदुःखाच्या चंद्रकला नी व्यापलेले! कधी दुःखाचे क्षण येतात पण त्यांची तीव्रता काळाबरोबर कमी कमी होत जाते आणि सुखाची पौर्णिमा दिसू लागते. पण कायमच पौर्णिमा राहिली तर तिचे काय महत्त्व! तसेच पूर्णत्व हेही कायमचे नसते!’ पूर्णत्वाच्या पलीकडे नष्टत्त्वाचे  उभे कडे’ अशी एक उक्ती आहे. त्याप्रमाणे सुखदुःखाची भरती ओहोटी आयुष्यात येत राहते. पुर्ण चंद्राचे या भरती ओहोटीशी कायमचे नाते असते. असा हा पूर्ण चंद्र प्रत्येक पौर्णिमेला आपण बघतो पण निसर्गाच्या अत्युत्तम अविष्काराचा दिवस कोजागिरी ला आपण पहातो.या दिवशी चंद्रप्रकाशात आटीव दुधाचा नैवेद्य दाखवून दुधाचा आस्वाद घ्यावा.आणि चांदणी रात्र आपण आनंदात घालवू या असाच विचार कोजागिरी पौर्णिमा निमित्ताने मनात आला!

© सौ. उज्वला सहस्त्रबुद्धे

मो.नं . 8087974168

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ अन्नपूर्णा ☆ सौ. मेधा सहस्रबुद्धे

☆ विविधा ☆ अन्नपूर्णा ☆ सौ. मेधा सहस्रबुद्धे ☆ 

आज ललिता पंचमी! म्हणूनच मी तुम्हाला हळदी-कुंकवाला बोलावते आहे. आज मी तुम्हाला आमच्या अन्नपूर्णेची ओळख  करून देते. तशी तर अन्नपूर्णा सर्वांबरोबर माहेरुनच आलेली असते, पण ही अन्नपूर्णा थोडी वेगळी आहे. पण आधी मस्त चहा घ्या.

“काकू, चहा फक्कड झाला आहे”. हो ना? तोही ह्या आमच्या अन्नपूर्णेनच बनवलेला आहे. तर ह्या आमच्या कडील कर्मयोगी! सौ चंदा  दिघे. आमची अन्नपूर्णा.

तशी त्यांची जन्मभूमी पुणे आणि कर्मभूमी पण पुणेच ! लहानपणी आपल्या आई बरोबर कर्मयोगच करत होत्या पण त्याच बरोबर शाळेतही जात होत्या. पुढे लग्न झाले आणि सुखावल्या. दोन मुले एक मुलगी, सासूबाई सर्वच कष्ट करत. छान मजेत होते. त्यावेळी त्या ब्युरोत सेवा कर्म करत होत्या. मुलीचे लग्न झाले. एका मुलाचे लग्न झाले. सर्व काही ठीक ठाक चालेले होते. घरात एक चिमुकली नात आली. चंदाबाई सुखाने कष्ट करत होत्या पण संसाराकडे पाहून विसरत होत्या. असेच दिवस चालले होते.

आणि एक वादळ आले. वादळात सगळेच कोलमडले. त्यांचा मोठा मुलगा पोहायला गेला असताना बुडाला आणि पाठचा तो त्याला वाचवताना बुडाला. काय हाहाकार! एकाच वेळी काळाने दोन्ही मुले हिरावली. दोघेही पती पत्नी खचले. खोल निराशेत गेले. सगळीकडे नुसता अंधार. पण काहीच दिवसात बागडणाऱ्या चिमुकलीकडे त्यांचे लक्ष गेले. तरुण सुंदर विधवा सून दिसली. आणि त्या अन्नपूर्णेने पदर खोचला. “पुनःश्च हरी ओम” करत कामाला सुरुवात केली. त्याच वेळी आमच्या सोसायटीत पोहोचल्या. सुविचारी अश्या ह्या दुर्गेने अजून एक निर्णय घेतला. तरुण सुनेचा पुनर्विवाह लावून दिला. आणि नातीची जवाबदारी स्वीकारली. तिला मोठी केली, शिकवली आणि तिचे लग्न करून ती नीट पार पडली.

केवढे मोठे मन !! पण मनातली ही सर्व दुःखे एका गाठोड्यात घरीच ठेवून येतात. जसे मन तसे अन्न  बनते. त्यामुळे नेहमी प्रसन्न. इथे फक्त कामाचाच विचार. त्यामुळे सगळे सुग्रास आणि राहणीमान पण तसेच. एवढी कामे करतात पण नेसलेल्या साडीला दिवसभर सुरकुती पण नसते. नवरात्री मध्ये तर रोज त्या त्या रंगाच्या साड्या नेसतात. सगळे सणवार आठवणीने साजरे करतात. आम्हालाही उत्साह देतात. अजून एक मोठी गोष्ट म्हणजे स्मार्ट फोन त्या सहजपणे वापरतात. वॉट्सअँप , फेसबुक वर त्या छान सक्रिय आहेत.

आमच्या सर्वांकडे येताना, प्रत्येक सणावारानुसार त्या काहीतरी घेऊन येतात. यात्रेला गेल्या की एखादा फोटो घेऊन येतील. नागपंचमीला वैदेहीला बांगड्या, मेहंदी आणतील . दुःखात सुद्धा सुख शोधायला ह्या माउलींकडून मिळते. १३५ कोटी लोकांचे सुख सारखेच असेल, दुःख मात्र वेगवेगळी !! अशा माउली प्रत्येकीकडे आहेत, त्यांची उणीव आपण lockdown मध्ये अनुभवली आहे . तर चला आज मी तुमच्या सर्वांसमवेत त्या माऊलीची साडी, खणा-नारळाने ओटी भरते.

तुम्ही पण घरी जाऊन तुमच्या तुमच्या माऊलीची ओटी भरा!

या देवी सर्व भूतेषु क्षुधा रुपेण संस्थितः, नमस्तस्यै नमस्तस्यै नमस्तस्यै नमो नम:।।

 

© सौ. मेधा सहस्रबुद्धे

पुणे

मो  9420861468

medhasahasrabuddhe@gmail.com

 ≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

 

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – काव्यानंद ☆ संधीप्रकाशात – कवी: बा. भ. बोरकर ☆ सौ. अमृता देशपांडे

सौ. अमृता देशपांडे

 ☆ काव्यानंद ☆ संधीप्रकाशात – कवी: बा. भ. बोरकर ☆ सौ. अमृता देशपांडे ☆ 

रसग्रहण:

श्रेष्ठ कवी बा.भ.बोरकर निसर्गदत्त   प्रतिभेचे कवी. ईश्वराने गोमंतभूमीला बहाल केलेला निसर्ग खजिना म्हणजे गर्द दाट हिरवाई, उंच उंच एकमेकांना लगटून उभे असलेले माड, फणस, पोफळी, खळाळणा-या नद्या, अथांग समुद्र, आणि लोभसवाणे समुद्रकिनारे. जिथे निसर्गाची लयलूट तिथे प्रेमाची बरसात.  निसर्ग आणि बोरकरांचे शब्द जेव्हा तद्रूप होतात, तेव्हा जे साहित्यशिल्प आकार घेतं, त्या असतात त्यांच्या कविता.

हिरवाईच्या कॅनव्हासवर रंगीत फुलांच्या नक्षीने चितारलेली छोटी छोटी  खेडी, ती कौलारू घरे, लहान लहान ओहोळ, झरे हाच त्यांच्या कवितेचा खरा बाज. बा.भ.बोरकर म्हणतात, ” हिरवळ आणिक पाणी तेथे सुचती मजला गाणी “.

सारं तारूण्य असं रोमांचित निसर्गा बरोबरच फुलण्यात  गेलेलं, प्रेमात आकंठ बुडालेलं. वय जसंजसं पुढे सरकत गेलं, तशी तशी कविता जास्त मुक्तपणे बहरत गेली. पुढे गंभीर होत गेली. तारूण्य सरलं, तरी प्रेम अधिष्ठित  होतंच. पैलतीराकडे चालताना आधार म्हणून जीवनसाथी पत्नीचा हात घट्ट धरून चालावेसे वाटू लागले. तिच्यासाठी अनेक प्रेमकविता करताना रंगणारं मन आयुष्याचं अंतिम सत्य समोर येताच गंभीर झालं. तिचं असणं जास्त जवळ असावंसं वाटू लागलं. तेव्हा मनातल्या भावनांनी  कवितेचं रूप घेतलं, आणि ही कविता जन्मली.

“संधीप्रकाशात अजुन जो सोने

तो माझी लोचने मिटो यावी”

संध्याकाळी फिकट अबोली, गडद केशरी प्रकाशात जोपर्यंत मावळत्या सुर्यकिरणांचे सुवर्ण मिसळते आहे,  अशाच सांजवेळी माझे डोळे मिटावेत.

आयुष्य छानपणे जगता जगता अशा सुंदर संध्याकाळी आयुष्य थांबावे,  ते ही कसे? तर शेवटच्या  क्षणी तू जवळ असावीस. बस् इतकीच इच्छा!

खळखळंत वहात येणारी अल्लड नदी जेव्हा समुद्राला मिळते,  तेव्हा शांत, समाधानी,  आणि संपूर्णं असते.

पत्नीप्रेम, निसर्ग प्रेम, मत्स्याहार प्रेम अशा वैविध्यपूर्ण प्रेमाची मुशाफिरी करणार-या  प्रेमाचा बहर ओसरून एक धीर गंभीर, निर्व्याज, अशारिरीक,  तितकिच खोल अशी अद्वैत रूपी अथांगता मनात भरून राहते.

अशावेळी पत्नीला सांगतात,  ” सखे, तुळशीचे एक पान माझ्या रसनेवर ठेव आणि त्यावर तू माझ्यासाठीच विहिरीतून ओढलेलं स्वच्छ, निर्मळ पाणी घाल,  ” थोर ना त्याहुनि तीर्थ दुजे “.

तुलसीपत्र हे पावित्र्याचं, मांगल्याचं, आणि निष्ठेचं प्रतीक.

आयुष्यभर अनुभवलेलं हे पावित्र्य,  ही निष्ठा अनमोल आहे. ते म्हणतात,  ” तुझ्याकडे तुलसीपत्रांची मुळीच कमतरता ( वाण) नाही. ” हा तिच्या निष्ठेचा केवढा सन्मान आहे! निष्ठेचं तुळसीपत्र , त्यावर प्रेमाचे निर्मळ पाणी जिभेवर शेवटच्या क्षणी पडणं,  यासारखं सद् भाग्य ते दुसरं कोणतं?

इथेच सर्व भावना थबकतात.  विचारशक्ती थांबते. कल्पनाशक्ती सुन्न होते.रोम रोम शहारतो.

पुढच्या ओळीत जाणवतं मुरलेलं खरं प्रेम काय असतं! ” तुझ्या मांडीवर डोकं विसावावं. ” ती मांडी कशी? तर ” रंभागर्भी वीज सुवर्णाची कांडी “. केळीच्या बुंध्यातल्या नितळ, मऊस्पर्शी, गो-या  गाभ्यात सुवर्णलडी सारखी सचेतन वीज असावी तशी

इतकी सूक्ष्म थरथर जाणवणा-या तुझ्या मांडीवर डोकं ठेवून विसावावे. आता एकच शेवटचं मागणं, ” वाळल्या ओठा दे निरोपाचे फूल,  भुलीतली भूल शेवटली. “.

शृंगार, आसक्ती, प्रेम, अद्वैत या सर्वांचा एकबंध.

“संधीप्रकाशात अजुन जो सोने

तो माझी लोचने मिटो यावी”

मृत्यू सारख्या अबोध, गूढ सत्याबद्दल दोन ओळीत केवढे मोठे तत्वज्ञान भरून राहिले आहे!

अतिशय शांत,समाधानी आयुष्य उत्कटपणे जगून शृंगार, प्रेम, निसर्ग असे सगळे धुमारे घेऊन पुढे कविता अध्यात्मात विलीन होते.  तिचा सहवास हाच श्वास, कासावीस जीवाला निष्ठेचं तुळशीपत्र हेच चिरंतन सत्य, तिनंच ओढलेलं पाणी हेच तीर्थ असतं. शेवटी एक लाडीक मागणी, ” वाळल्या ओठा दे निरोपाचे फूल “…… ह्या एकाच क्षणात पराकोटीची अनेक सुखे, अपरिमित समाधान ” संतर्पणे ” सामावली आहेत.

उत्कट, बहारदार आणि तृप्त भावना आपल्या कवितांमधून व्यक्त करणारे बा.भ. बोरकर आणि त्यांच्या अप्रतिम कविता हा मराठी साहित्याचा खजिना आहे.

 

© सौ अमृता देशपांडे

पर्वरी- गोवा

9822176170

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – सूर संगत ☆ सूर संगत (भाग-२) –रागनृपती भूप ☆ सुश्री आसावरी केळकर-वाईकर

सुश्री आसावरी केळकर-वाईकर

☆ सूर संगत (भाग – २) –रागनृपती भूप ☆ सुश्री आसावरी केळकर-वाईकर ☆ 

मागच्या रविवारचा पहिला लेख वाचल्यावर अनेक वाचकांनी आवर्जून प्रतिक्रिया कळवल्या आणि काहींनी प्रश्नही विचारले. त्यापैकी एक प्रश्न असा होता ‘एकूण स्वर सात असतात की बारा?’ तर आपण शुद्ध, कोमल, तीव्र स्वरांविषयी जाणून घेताना ह्या प्रश्नाचंही नेमकं उत्तर मिळेल. खरंतर ‘सूर अनंत असतात’ असं पं. कुमार गंधर्वांसारख्या गानतपस्व्याकडून एका मुलाखतीत ऐकल्याचं स्मरतं! त्यांच्या सूक्ष्म दृष्टिकोनातून नाही पण आपल्या सामान्य दृष्टिकोनातून तरी ह्याचाही थोडासा उलगडा होतो का पाहूया! मुळात ‘सा’ हा सप्तकाचा आधारस्वर म्हणता येईल. आधारस्वर म्हणजे काय?… तर सोप्या शब्दांत असं म्हणूया ‘नंबर लाईन वरचा झिरो’! आपण कुठेही संख्यारेषा काढत असताना आपले परिमाण(युनिट) काहीही असेल तरी शून्याचा बिंदू ठरल्यावरच त्याच्या आगेमागे आपल्याला संख्यांचे मार्किंग करता येते. तसंच एकदा ‘सा’ ठरला कि त्या स्थानाच्या अनुषंगाने मग इतर स्वर सहजी गाता/वाजवता येतात कारण त्यांची ‘सा’पासूनची अंतरं ठरलेली आहेत.

आपण फूटपट्टी डोळ्यांसमोर आणूया आणि २ इंच हे परिमाण(युनिट) घेऊ. आता शून्यावर ‘सा’(०) आहे असं मानलं तर शुद्ध रे (२), शुद्ध ग (४), शुद्ध म (५) प(७), शुद्ध ध(९), शुद्ध नि (११) आणि त्यापुढं वरचा सा(१२) अशी स्वरांची स्थानं ठरलेली आहेत. ही अशीच का? इतक्या अंतरावरच का? ह्याचं उत्तर ‘स्वर-संवाद’ हे आहे. ‘सा’चा ज्या-ज्या स्थानांवरील सुरांशी चांगला संवाद घडतोय असं वाटलं त्या-त्या स्थानाला सप्तकात मुख्य स्वराचं स्थान दिलं गेलं. आणखी सोपं म्हणजे ‘सा’ची ज्यांच्याशी सुंदर मैत्री झाली त्या सुरांना त्याच्या अंतरंगात म्हणजे सप्तकात स्थान मिळालं. तर असे अगदी घनिष्ट मैत्री होऊ शकणारे (फास्ट फ्रेंडशिपवाले) सहा मित्र ‘सा’ला सापडले आणि त्यापैकी पाच जणांच्या फास्ट फ्रेंडशी ‘सा’चीही चांगली मैत्री झाली. हे पाच जण म्हणजे ‘सा’ आणि शुद्ध रे च्या बरोबर मध्यबिंदूवर असणारा ‘कोमल रे (१)’,  शुद्ध रे आणि शुद्ध ग च्या मध्यबिंदूवरचा ‘कोमल ग(३)’, शुद्ध म आणि ‘प’च्या मध्यबिंदूवरचा ‘तीव्र म(६)’, ‘प’ आणि ‘शुद्ध ध’च्या मध्यबिंदूवरचा ‘कोमल ध(८)’ आणि शुद्ध ध आणि शुद्ध नि च्या मध्यबिंदूवरचा ‘कोमल नि (१०)’! अशाप्रकारे आपल्याला बारा स्वर(शून्य ते अकरा) आहेत असं म्हणता येईल… सात मुख्य स्वर आणि त्यापैकी पाचांचे प्रत्येकी एकेक उपस्वर, ज्याला सांगितिक भाषेत विकृत स्वर असे म्हटले जाते!

एकूण पाहाता असं लक्षात येईल कि ‘सा’ आणि ‘प’ ह्या दोन स्वरांची एकच फिक्स्ड जागा आहे, त्यांचं कोणतंही व्हेरिएशन नाही, म्हणूनच त्यांना ‘अचल’ स्वर म्हटलं जातं. त्यामुळे त्यांना शुद्ध/कोमल/तीव्र असं काहीच संबोधलं जात नाही. उरलेल्या पाचही स्वरांचं प्रत्येकी एकेक व्हेरिएशन आहे. त्यापैकी जे व्हेरिएशन त्या-त्या शुद्ध स्वरापासून अर्धं युनिट खाली आहे त्याला ‘कोमल’ म्हटलं गेलं आणि एक व्हेरिएशन शुद्ध स्वरापासून अर्ध युनिट वरती आहे/ चढं आहे त्याला ‘तीव्र’ असं म्हटलं गेलं आहे.

तर ओळीनं स्वर असे येतील…. सा(०) कोमल रे(१) शुद्ध रे(२) कोमल ग(३) शुद्ध ग(४) शुद्ध म(५) तीव्र म(६) प(७) कोमल ध(८) शुद्ध ध(९) कोमल नि(१०) शुद्ध नि(११) आणि वरचा सा(१२). ह्याच स्थानावर सप्तक पूर्ण का होतं? तर साऊंड फ़्रिक्वेन्सीची संख्या इथं बरोबर दुप्पट होते आणि ती ऐकताना असं जाणवतं कि हा सूर मूळ ‘सा’ सारखाच ऐकू येतो आहे फक्त वेगळ्या, चढ्या स्थानावरून! अशा प्रकारे एका सप्तकात एकूण मुख्य सात स्वर आणि त्यापैकी पाच स्वरांचेच प्रत्येकी एकप्रमाणे पाच विकृत स्वर, असे एकूण बारा स्वर अंतर्भूत असतात असं ढोबळमानाने म्हणता येईल.

आता महत्वाची गोष्ट म्हणजे, हा सप्तकातील स्वरांतरांचा साचा असाच कायम राहातो आणि निसर्गदत्त आवाजानुसार गाणाऱ्या प्रत्येक व्यक्तीची पट्टी (सा/pitch) वेगळी असू शकते.

यापुढं, नंबर लाईनचा विचार करता प्रत्येक दोन संख्यांच्या मधेही कित्येक बारीक रेषा असतातच. त्याचप्रमाणे प्रत्येक दोन स्वरांच्या मधेही अनेक फ्रिक्वेन्सीज असणारच. फक्त त्या प्रत्येक फ्रिक्वेन्सीचा ‘सा’शी अगदी सुखद संवाद होऊ शकत नाही, अतिसूक्ष्म फ्रिक्वेन्सीज तर आपल्या ऐकण्याच्या क्षमतेतच नसतात… पण म्हणून त्या अस्तित्वातच नाहीत असं मात्र म्हणता येणार नाही. जसं पॉईंट(दशांश चिन्ह)नंतर बरेच नॉट (म्हणजे शून्यं) आणि त्यापुढं एखादी संख्या आली तर तिचं वजन आपल्याला वजनकाट्यावर दिसणार नाही, हाताला जाणावणार नाही, पण म्हणून तो सूक्ष्म वजनाचा ‘अणू’ अस्तित्वात नाही असं नाही म्हणता येत. इथं कुमारजींच्या वाक्याचा कदाचित थोडाफार अर्थ लागू शकतो.

संगीत शिकायला सुरू करताना बहुतांशी ज्या रागाने सुरुवात केली जाते त्या ‘भूप’ रागाविषयी आज थोडंसं जाणून घेऊ. शिक्षणाच्या सुरुवातीच्या काळातला राग म्हणून ह्याला प्राथमिक राग असं संबोधणं मात्र संयुक्तिक होणार नाही. कित्येक श्रेष्ठ कलाकारांनी आयुष्यभर रागसंगीताचा अभ्यास केल्यानंतर बऱ्याच पुढच्या टप्प्यावर असं विधान केलेलं आहे कि, ‘असं वाटतं अजून भूप समजलाच नाहीये.’ हा अर्थातच त्यांचा विनय आ्सतो, पण ह्याचा शब्दश: अर्थ न घेता ‘भूपाचा अभ्यास ‘नव्यानं’ करायला हवा आहे’ हे कोणत्याही कलाकाराचं वाटणं अस्थायी म्हणता येणार नाही. शुद्धच असल्यानं पटकन ओळखीचे वाटणारे ‘सा रे ग प ध सां’ हे सूर भूपाच्या आरोहात आणि ‘सां ध प ग रे सा’ हे अवरोहात येतात म्हणून वाटताना राग सोपा वाटतो. मात्र एखाद्याची संगीतसाधना जितकी सखोल होत जाते तितका त्याला एकच राग आणखीआणखी विशाल भासू लागतो. ह्या रागाच्या तर नावातच ‘राजेपण’ आहे! म्हणून रागांचा राजा, रागनृपती तो भूप! किशोरीताई आमोणकरांचं ‘भूपातला गंधार हा स्वयंभू आहे’ हे चिंतनयुक्त विधान केवढं विस्मयचकित करणारं आहे! ताईंचीच भूपातली ‘सहेला रे आ मिल जावे’ ही बंदिश न ऐकलेला संगीतप्रेमी अस्तित्वातच नसेल.

भूप म्हटलं कि पटकन डोळ्यांसमोर येतात ‘ज्योती कलश छलके’ (भाभी की चूडियॉं), ‘सायोनारा सायोनारा’ (लव्ह इन टोकिओ), इन ऑंखो के मस्ती के(उमराव जान), दिल हूं हूं करे(रुदाली) अशी अनेक हिंदी चित्रपटगीतं आणि ‘स्वये श्रीराम प्रभू ऐकती’, ‘खेळ मांडियेला वाळवंटी’ ‘धुंद मधुमती रात रे’ ‘पूर्वेच्या देवा तुझे सूर्यदेव नाव’ अशी कित्येक मराठी मधुर गीतं आणि सकाळी रेडिओवर लागणाऱ्या ‘घनश्याम सुंदरा श्रीधरा’ ‘ऊठ पंढरीच्या राया’ ‘उठा उठा हो सकळीक’ वगैरे बऱ्याचशा भूपाळ्या! मात्र गंमतीची गोष्ट अशी कि रागशास्त्रानुसार भूप हा रात्रीच्या पहिल्या प्रहरी गायला जाणारा राग आहे! अर्थात, बहुतांशी रचनांमधे प्रामुख्याने भूप दिसत असला तरी त्यात इतर सूरही वापरलेले आहेत. ‘ओंकार प्रधान रूप गणेशाचे’ ही रचना किंवा ‘अबीर गुलाल उधळीत रंग’ ही पं. जितेंद्र अभिषेकींची रचनाही भूपाची आठवण करून देणारी मात्र रागाशिवाय इतर स्वरही अंतर्भूत असलेली! ‘सुजन कसा मन चोरी’ हे संगीत स्वयंवर मधील नाट्यपद मात्र स्पष्ट भूपातलं, कारण त्याला भूपातल्या एका बंदिशीबरहुकूमच भास्करबुवा बखलेंनी स्वरसाज चढवला आहे. शोधायलाच गेलं तर अजून अनेक रचना सापडतील.

आता गंमत अशी आहे कि भूपाचेच आरोह अवरोह असणारा आणखीही एक राग आहे. पण त्याचे वादी-संवादी स्वर वेगळे असल्याने त्याचं रुपडं एकदमच वेगळं भासतं. भूपाचे वादी-संवादी स्वर हे ‘ग’ आणि ‘ध’ आहेत तर त्या रागाचे बरोबर उलट आहेत हा महत्वाचा फरक, दोन्हीचे थाटही वेगळे आहेत आणि अर्थातच फरकाच्या दॄष्टीने इतरही काही बारकावे आहेतच. वादी-संवादी स्वर हा काय प्रकार आहे? केवळ त्यांच्या बदलामुळं आरोह-अवरोह तेच असतानाही अख्खा वेगळा राग कसा निर्माण होऊ शकतो? हाच खरं तर आपल्या रागसंगीताचा आत्मा, वैशिष्ट्य आणि गर्भश्रीमंती आहे! या गोष्टींविषयी पुढच्या लेखात जाणून घेऊया.

©  सुश्री आसावरी केळकर-वाईकर

चेन्नई

मो 09003290324

ईमेल –  asawarisw@gmail.com

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ पहिल्या सुखांच्या सरी ☆ सौ. श्रेया सुनील दिवेकर

☆ विविधा ☆ पहिल्या सुखांच्या सरी ☆ सौ. श्रेया सुनील दिवेकर ☆

तो मातीचा दरवळणारा सुवास अत्तरा पेक्षाही भारी वाटून जातो. मनातली मरगळ कशी लांब पळवून नेहतो. मन कसे प्रसन्न टवटवीत करून सोडतो.

ते टपोरे थेंब पाहताना नेत्र कसे सुखावून जातात आणि ती रिमझिम सर जेव्हा अंगावर पडते तेव्हा सारी काया सुखावते. पानं आनंदानी डोलू लागतात तर फुलपाखरू शांत फुलावर बसुन पावसाची रिमझिम पाहत राहते.

प्रत्येकाला हा अनुभव नक्की आला असेल नाही का?

तो पहिला पाऊस, तो आला की कसे सारे सुखावतात अगदी लहान मुलांपासून आजी आजोबा पर्यंत. प्रत्येकाच्या आठवणी ताज्या टवटवीत होऊन जातात.

काहीजण आपल्या जुन्या आठवणीत रमतो, तर काहींच्या मनाची तगमग शांत होऊ पाहत असते, कुणाचे नेत्र चोरून वाहत असतात तर कोण पावसात मनमुराद भिजत असतो. तर कोणाला गरम गरम चहा भजीची हुक्की आलेली असते.

अगदी रांगणारे मुल सुद्धा पावसात भिजण्यासाठी धडपडत असते. तीच थोडी मोठी मुल आईची नजर चुकवून मनसोक्त पावसात भिजण्याचा आनंद घेतात.

मला ना माझ्या लहानपणी चि एक गंमत आठवते. पावसाळ्यात आई अगदी आठवणीने रेनकोट द्यायची वर बजावून सांगायची पावसात भिजायचे नाही. आईच्या समाधानासाठी तो आम्ही घेऊन जात होतो हे खरे पण जर शाळा सुटल्यावर पाऊस आला तर घर जवळ येईपर्यंत हा बिचारा रेनकोट दप्तरातून बाहेर येतच नव्हता. घर जवळ आले की हळूच तो अंगावर चढवला जायचा. आई विचारायचीच रेनकोट होता ना मग कसे भिजला? उत्तर तयारच असायचे अग दप्तरातुन काढे पर्यंत मोठी सर आली आणि भिजलो. पण शेवटी आईच ती बरोबर ओळखायची कधी एखादी चापटी मिळायची, नाही तर कधी ती पण आमच्याबरोबर मनमुराद हसायची. कदाचित् तिनेही तेच केले असेल नाही का तिच्या बालपणी.

अरे हा पाऊस तर मला बालपणात घेऊन गेला की, मला खात्री आहे तुम्हाला ही घेऊन गेला असेल बालपणात. हो ना?

हळू हळू सार्‍या आठवणी कश्या मनाच्या कोपऱ्यातून डोकावू लागतात नाही का ? त्या केलेल्या छोट्या छोट्या होड्या त्या पाण्यात सोडून कोणाची किती लांब जाते ह्यावर लावलेली पैज, तो कॉलेजचा कट्टा, ते कॅन्टीन तो कटींग चहा आणि आपला तो ग्रुप. वाटले ना परत जावे कॉलेज मधे आणि परत पडावा मुसळधार पाऊस.

अरे आपणच नाही काही अगदी आपले आजी आजोबा सुद्धा रमून जातात पावसात ते ही सैर करून येतात भूत काळात. काहीना आठवणीने डोळ्यात पाणी येते तर काही ते पावसांच्या सरित लपवतात.

आपल्या प्रमाणेच निसर्ग कसा सुखावून जातो. त्यानी नेसलेला हा हिरवागार शालू पाहताना त्याचे हे सौंदर्य पाहताना कसं मन प्रसन्न होऊन जाते. पक्षी ही झाडाच्या फांदीवर बसुन झोके घेत आनंद लुटत असतात. तर ही धरती शांत शीतल होत असते.

सहज मनाच्या कोपऱ्यातून? 

 

©  सौ. श्रेया सुनील दिवेकर

09.8.2020

मो 9423566278

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares