मराठी साहित्य – जीवनरंग ☆ बेचैनी… – भाग-२ ☆ श्री प्रदीप केळूसकर ☆

श्री प्रदीप केळुस्कर

?जीवनरंग ?

☆ बेचैनी… – भाग-२ ☆ श्री प्रदीप केळूसकर

(‘खरे आहे.. जगात अशी विषमता आहे खरी.. पण त्याला आपण काय करणार?

‘काय तरी करावे असे वाटते. ’ अजयने फोन ठेवला.) – इथून पुढे —

एक दिवस तिच्या जाऊने लक्ष्मीने तिच्या मुलाला अनिकेतला पार्कमध्ये न्यायचे ठरविले. सासू आणि मालती पण सोबत होत्याच.. अनिकेत पार्कमध्ये थोडा खेळला आणि शेवपुरी मागायला लागला.. मालती त्याला घेऊन कोपऱ्यातल्या भैय्याकडे गेली.. तिने चार शेवपुरी बांधून घेतली, इतक्यात तिचे लक्ष बाजूला उभ्या असलेल्या भिकाऱ्यांच्या मुलाकडे गेलं.. ती दोन मूल.. अंगात धड कपडे नाहीत.. केसाला कित्येक दिवस तेल नाही.. तिच्याकडे काही तरी मागत होती.. मालतीला गलबलून आलं.. काय ही गरिबी.. तिने झटकन हातातील शेवपुरीची पूडी त्या मुलांना दिली. तिने भैय्याला पुन्हा ऑर्डर दिली. ती घेऊन जाताना ती पहात होती… ती दोन मुले त्या शेवपुरीवर तुटून पडली होती.. तिच्या डोळ्यात समाधान होत.

तिची सासू आणि जाऊ सर्व पहात होत्या.. तिने त्या भिकारी मुलांना ती पूडी दिल्याचे त्याना आवडले नव्हते.

‘अशाने भिकारी कमी होत नाहीत.. वाढतात.. काम न करता खायला मिळाले ना.. मग काम कशाला करायला हवे?

‘ती करतील हो.. करतील… गरिबी हा त्त्यांचा दोष नाही.. समाजाचा आहे.. समाजात श्रीमंत गरीब अशी दरी पडली आहे.. आहे त्याना त्याचे काय करावे असा प्रश्न पडला आहे.. आणि नाही त्याना.. तिला अनुजा आठवली.. धक्के खात रोज नालासोपारा.. मग st.. मग चालत.. पुन्हा दुसऱ्या दिवशी उलट प्रवास..

मालतीला रात्रभर झोप आली नाही.. पार्कमधील ती दोन पोरे.. त्त्यांचे आसूसलेले डोळे, तिचा पिच्छा पुरवत होते. आज या मुलांना आपण शेवपुरी दिली पण उदया कोण देणार? बहुतेक लोक आपल्या सासुसारखे त्याना हिंदीसफिडीस करणार.. मग काय करतील ती मुले..

दुसऱ्या दिवशी अजयचा फोन आला तेंव्हा तिने कालचा पार्कमधील प्रसंग सांगितला.. पण त्या आधीच त्याच्या आईने तो सांगितला होता. अजय म्हणाला –‘अशी दरी आहेच, पण आपण काय करू शकतो.. अशा किती मुलांना आपण जेऊखाऊ घालू शकतो..

तिने फोन ठेवला.

त्यान्च्या घरात सरस्वती बरीच वर्षे कामाला येत होती.. मालती लग्न होऊन आली, त्या दिवसापासून सरस्वती होती.. घरातील भांडी.. लादी.. कपडे.. तीच करायची. अचानक ती यायची बंद झाली. तिचा नंबर लक्ष्मीकडे होता.. ती रोज फोन करायची पण कुणीच उचलायचा नाही.. घरातली कामे करायची सवय नसल्याने पंचाईत झाली.. पण मालतीने तिची कामे केली. पण तिच्याही मनात येत होते.. सरस्वती यायची बंद झालीच पण फोन पण बंद? तिने लक्ष्मीला तिच्या घरचा पत्ता विचारला आणि चौकशी करत करत ती सरस्वतीच्या झोपडीत येऊन पोचली… ते दारिद्र्य.. ती उघडी गटारे.. नागडी पोर.. डुकरे घुशी, उंदीर यांचा सुळसुळाट… दारू, जुगार.. नशिले पदार्थ.. भडक कपडे घातलेल्या मुली.. सगळीकडे नुसती घाण.. मुंबईची ही दुसरी बाजू मालतीने फक्त सिनेमांत पाहिली होती. तशाच एका झोपडीत सरस्वती झोपली होती.. नागीण नावाच्या आजाराने तिला घेरले होते. पाठीपासून छातीपर्यत नागीण पसरली होती.. मालतीने टॅक्सी मागवली आणि सरस्वतीला केइएम हॉस्पिटलमध्ये पोचवले..

सरस्वतीच्या घरातील आणि आजूबाजूची गरिबी पाहून ती अस्वस्थ झाली.. कशी राहतात ही माणसे? यांना कसे बाहेर काढता येईल या घाणीतून? काय करावे?

अनेक प्रश्न तिला पडत होते.

हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केलेल्या सरस्वतीची ती चौकशी करत होती.. उपचारानी सरस्वती बरी होत होती.

.. तीन महिन्याचे काम संपताच अजय परत आला आणि मालती खूष झाली.. तिच्या विचाराचा आदर करणारा घरात तिच्या हक्काचा माणूस अजय होता.

ती आता अजयशी या विषयावर बोलू लागली. अजयला पण तीच कौतुक होत.. लहानपणापासून श्रीमंतीत राहून सुद्धा तिला गरिबाबद्दल दया वाटतं होती.. जगातील दारिद्र कमी व्हायला हवे यासाठी तिला प्रयत्न करायचे होते.. पण सुरवात कशी करावी हे कळत नव्हते.

अजयने तिला एक म्यॅगेझीन आणून दिले.. त्यात पुण्यातील एक डॉक्टर भिकाऱ्यांच्या मुलासाठी शिक्षण हा उपक्रम राबवत होता.. त्यासाठी समाजातील बरीच मंडळी आर्थिक आणि शारीरिक मदत करत होती. ती अजयला घेऊन पुण्याला गेली आणि या डॉक्टरना भेटली.. त्त्यांचे काम पाहिले.. ती प्रभावित झाले. ती डॉक्टरना म्हणाली..

‘तुमच्यासारखें मलाही काम करायचे आहे.. सुरवात कुठून करू?

“तुम्ही ओळखता अशा एखाद्या दरिद्री कुटुंबापासून सुरवात करा.. त्या कुटुंबाला आधार द्या.. मुलांना सुशिक्षित करा..

मालती विचार करत राहिली.. कुठून सुरवात करू? अचानक तिच्या डोळयांसमोर सरस्वतीची झोपडी आली.. त्या झोपडीत सरस्वतीची नवऱ्याने टाकलेली मुली आणि तिची दोन मुले होती.. सरस्वती आता बरी होऊन घरी आली होती. ती सरस्वतीच्या घरी गेली.. सरस्वतीच्या मुलीची दोन मुले अजून शाळेत जात नव्हती.. आजूबाजूला अशीच आणखी बारा मुले होती. तिने अजयला सांगून एक गाडी ठरवली आणि या चवदा मुलांना दादरच्या शाळेत प्रवेश घातले. सरस्वती सून घरात बसुन होती तशीच आजूबाजूला सहा मुली घरात रिकाम्या होत्या. कुर्ल्याच्या गारमेंट कंपनीत या मुलींना नोकरी मिळवून दिली..

ही बातमी कळताच अजून स्त्रिया तिला भेटायला आल्या.. त्या सर्वाना तिने हॉस्पिटल, मॉल, कुरिअर सेवा, हॉटेल्स अशा ठिकाणी नोकऱ्या मिळवून दिल्या. त्या भागात आता तिच्या शब्दाला किमत आली.

अजय कौतुकाने सर्व पहात होता.. मालती खूष होती.. पुण्याचे डॉक्टरपण फोन करून चौकशी करत होते.

मालतीचा व्याप वाढला.. मग संध्या, मीना तिच्या मदतीला आल्या.. काही कार्पोरेट्स कडून मदत मिळू लागली. पेपर मधून मुलाखती येऊ लागल्या. मुलाखतीत ती म्हणाली “मी बेचैन स्त्री आहे.. मी अस्वस्थ असते.. मला पैसे दागिने यात समाधान नव्हते.. समाजातील बरीच लोक दारिद्यात आहेत, त्या सर्वाना आपण बाहेर काढू शकत नाही.. पण निदान काहीजणांना. पुण्यातील एक डॉक्टर भिकारी नष्ट करण्याचा प्रयत्न करत आहेत.. प्रत्येकाने स्वाभिमानाने जगायला हवे. भीक मागून नव्हे..

खुप दिवसांनी अजय आणि मालती गप्पा मारत चहा घेत होती.. अजय गमतीने म्हणाला “मालू.. झोपड्यातून शाळेत न जाणाऱ्या मुलांना तू शाळेत पाठविलेस..

पण आता आपण आपल्या मुलाचा विचार करूया का..

त्याच्या गमतीने मालती लाजली आणि त्याच्या कुशीत शिरत म्हणाली “, , होय.. आता विचार करूयाच..

समाप्त –

© श्री प्रदीप केळुसकर

मोबा. ९४२२३८१२९९ / ९३०७५२११५२

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ बेचैनी… – भाग-१ ☆ श्री प्रदीप केळूसकर ☆

श्री प्रदीप केळुस्कर

?जीवनरंग ?

☆ बेचैनी… – भाग-१ ☆ श्री प्रदीप केळूसकर

जानेवारीत मालती लग्न करून अजयच्या घरी आली आणि चार महिन्यात अजयला तीन महिन्यासाठी सिंगापूरला जावे लागले. अजय आणि मालती दोघेही कष्टी झाले पण तीन महिन्यात तो परत मुंबईला येणार होता. मालती नोकरी करत नव्हती पण या मोठया फ्लॅटमध्ये तिची सासू विदयाताई, दीर विराज आणि त्याची पत्नी लक्ष्मी.. त्त्यांचा मुलगा अनिकेत एकत्र राहत होती. प्रभादेवीसारख्या उच्चभू वस्तीत तीनबेडरूमचा प्लॅट.. प्रत्येक बेडरूमला ग्यालरी.. उंची फार्निचर, उत्तम किचन.. पार्किंगलॉट मध्ये दोन मोठया गाड्या.. ड्रायव्हर इत्यादी. अजित एका मल्टिनॅशनल औषध कंपनीत प्रॉडक्टमॅनेजर आणि त्याचा मोठा भाऊ विराज चार्टर अकाटंट.. त्यान्च्या वडिलांची पण CA फर्म होती.. तीच विराज सांभाळत होता. त्याची पत्नी लक्ष्मी पण श्रीमंत कुटुंबातील आणि मालती पण एका इनकमटॅक्स ऑफसरची मुलगी.

लक्ष्मी आणि मालती जरी नोकरी करत नव्हत्या तरी त्यान्च्या माहेरहून भरपूर दागिने घालून आणि सासरच्या मंडळींना मोठया गिफ्ट देऊन या घरात आल्या होत्या. दोघींच्या माहेरहून भरपूर दागिने घातले होते.

असे असले तरी मालतीच्या अंगावर एक ग्रॅमपण सोने नसे.. त्याची तिला आवडच नव्हती पण तिची जाऊ आणि सासू मात्र कायम अंगावर दागिने घालून मिरवत. मात्र मालतीला हे आवडत नव्हते.. तिला साधे आयुष्य आवडे.. त्यान्च्या गाड्या होत्या.. ड्रायव्हर होते पण ती बाहेर जाताना चालत जाई किंवा बस ट्रेनने जाई. तिची खरेदी पण साधी असे. एकदा नात्यात लग्न होते म्हणूंन तिच्या सासूबाईंनी दोन्ही सुनेना खरेदीसाठी मुंबईतील मोठया दुकानात नेले. गाडीतून उतरून दुकानाकडे जाताना तिला अचानक तिची वर्गमैत्रीण अनुजा समोर आली. तिला अनेकवर्षांनी पहाताच ती थांबली आणि तिने मागून तिला मिठी मारली.. अनुजा भांबवली.. मालतीला पहाताच तिला आनंद झाला.

“माले.. किती वर्षांनी.. कुठे असतेस?

‘अग लग्न झाल माझं यावर्षी.. नवरा सिंगापूरला गेलाय चार महिन्यासाठी.. या काय सासूबाई आणि ही जाऊ लक्ष्मी…

‘बर बर.. तू नोकरी करतेस ना?

‘नाही ग.. करायची इच्छा होती पण.. घरच्याच म्हणणं काही गरजच नाही तर.. तू नोकरी करतेस ना?

‘हो तर.. नोकरी न करून भागेल कस आमचं? मी फोर्ट मधील खादी भंडारात सेल्सगर्ल आहे आणि नवरा एका खाजगी लायब्ररी मध्ये आहे… तू राहतेस कुठे मालती?

“प्रभादेवी.. गणपतीमंदिर आहे ना.. त्याच्या समोर टॉवर आहे.. राजव्हिला.. सतराव्या मजल्यावर रहातो आम्ही.. आणि तू ग अनुजा?

“नालासोपारा. नालासोपारा स्टेशन च्या बाहेर st असते.. तिथून अंदाजे अर्धा तास.. मग दहा मिनिटे चालायचं..

मालतीने पटकन अनुजाचा हात पकडला.. ‘, खुप त्रास होत असणारं तुला अनु..

त्रास होतोच.. पण काय करू.. आमची दोघांची मिळून मिळकत ती किती? इकडे फोर्ट मध्ये कुठे तुम्ही तिघीजणी?

‘अग नात्यात एक लग्न आहे म्हणून खरेदी.. सासूने मला इकडं आणलं.. पण यात फार इंटरेस्ट नसतो..

“बापरे.. असल्या दुकानात खरेदी करायचे आम्ही स्वप्नात पण आणू शकत नाही… आमची खरेदी रस्त्यावर.. मस्त आणि स्वस्त.. विशादाने अनुजा हसली आणि चालू लागली.

 मालती तिला पाठमोळी पहात राहिली आणि जडपायानी त्या श्रीमंत आणि महागड्या दुकानात शिरली.

मालती त्या महागडया कपड्याच्या दुकानात शिरली, तेंव्हा तिची सासू आणि जाऊ नवीननवीन शालू घेण्याच्या घाईत होत्या.. बरेच शालू पारखून शेवटी त्यानी प्रत्येकी दोनदोन शालू खरेदी केले. मालतीने काहीच खरेदी केली नाही.. तिच्या सासूला आश्चर्य वाटले..

‘का ग,? निवडलेस नाहीस अजून?

‘नकोच मला… लग्नातील आहेत चार.. तेच नेसणे होत नाही आणि नवीन घेउंन काय करू?

‘अग पण लग्न आहे माझ्या भाच्याच.. त्याला तू लग्नातील शालू नेसून जाणार?

हो.. मला आवड नाही नटण्याची.. उगाच वायफळं खर्च.. त्यातीलच शालू नेसीन मी..

‘बर बाई.. तुझी मर्जी. पण अजयला म्हणशील.. आईनी आणि लक्ष्मीने आपल्याला शालू घेतले.. मला विचारले नाही..

‘मी मुळीच म्हणायची नाही.. त्याना पण कळले आहे मी कशी आहे ती..

लक्ष्मीने नाक मुरडलं आणि गाडीच्या दिशेने निघाली.

मालती गाडीत बसली.. तिची सासू आणि जाऊ लक्ष्मी नवीन शालच्या किमती आणि रंग तिला सांगत होत्या पण ते तिच्या डोक्यपर्यत पोहोचत नव्हते. तिच्या डोळ्यसमोर येत होती.. अनुजा. अनुजा काळे.. वर्गातील सर्वात हुशार मुलगी पण गरीब. तिच्या बुद्धिपुढे आपण कुठेच नव्हतो. पण आज आपण अजयसारख्या देखण्या आणि कर्तबदार पुरुषाची पत्नी आहोत.. प्रभादेवी सारख्या श्रीमंत वस्तीत राहतोय.. पैसा, दागिने.. गाड्या सर्व आहे आणि वर्गातील सर्वात हुशार अनुजा… खाडिभंडारात सेल्सगर्ल म्हणून नोकरी करते आहे आणि नालासोपाराहुन रोज फोर्ट मध्ये लटकत लटकत नोकरीसाठी येते आहे. असे का? का असा विरोधाभास? कारण तिची गरिबी हे कारण.. आपले वडील इनकमटॅक्स ऑफिसर.. म्हणजे भरपूर पैसे खाल्ले असणारं.. त्यातून पालीहील सारख्या भागात अलिशान घर.. त्याना शोभेल असा त्यानी जावई शोधला अजयसारखा.. दोन्ही बाजू श्रीमंत.. भरपूर दागिने.. सोन्याचे. हिऱ्याचे.. पण यात माझे क्रेडिट कोणते? मग का मी पैसे खर्च करू? गरज नसताना उंची शालू नेसू..

चार दिवसांनी विदयाताईच्या भाच्याचे लग्न. विदयाताई आणि लक्ष्मीची जोरात तयारी सुरु होती पण मालती शांत होती.. लग्नाला जाताना दोघीनी नवीन शालू आणि भरपूर दागिने अंगावर घातले तर मालतीने एकही दागिना घातला नाही.. तिला अशी पाहून विदयाबाई कडाडल्या 

‘काय हे लंकेच्या पार्वतीसारखे.. एकही दागिना नाही अंगावर..

मला दागिन्याची हौसच नाही.

‘अग पण माझ्या माहेरचं लग्न.. सर्वजण तयारी करून येणार आणि माझी सून.. अशी?

‘लक्ष्मी आहे ना दागिने घालून.. एका सुनेने नाही घातले तर काय होते?

विदयाताईचा नाईलाज झाला.. रागारागाने त्या गाडीत बसल्या. त्यान्च्या बाजूलाच मालती दागिने न घालता बसली.

रात्री अजयचा फोन आला..

‘मालू.. तू कसला त्रास होतो आहे का?

‘नाही..

‘मग आजच्या लग्नात साधी साडी.. दागिने घातले नाहीस..

तिच्या लक्षात आले सासूने मुलाला फोन करून सांगितले असणारं.

‘नाही रे.. खरं तर मला नटणे आवडत नाही.. दागिन्याची हौस नाही..

‘कमाल आहे.. कुठल्या स्त्रीला दागिन्याची हौस नसते.. हे मी प्रथमच पहातो आहे..

“तुझे असे विचार पहिल्यापासून आहेत काय?

“काहीप्रमाणात होते.. पण त्या दिवशी अचानक माझी वर्गमैत्रीण अनुजा भेटली आणि तिची परिस्थिती पाहून मी अस्वस्थ झाले.. मी उंची साडया नेसाव्या, दागिने घालावे असा काय मोठा पराक्रम केला आहे? मी श्रीमंत बापाची लेक आणि श्रीमंत घरातली सून.. एवढाच माझा पराक्रम..

‘खरे आहे.. जगात अशी विषमता आहे खरी.. पण त्याला आपण काय करणार?

‘काय तरी करावे असे वाटते.

अजयने फोन ठेवला.

– क्रमशः भाग पहिला 

© श्री प्रदीप केळुसकर

मोबा. ९४२२३८१२९९ / ९३०७५२११५२

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ सुसंस्कृत… लेखिका : सुश्री ज्योती रानडे  ☆ प्रस्तुती – सौ. गौरी गाडेकर ☆

सौ. गौरी गाडेकर

? जीवनरंग ?

☆ सुसंस्कृत… लेखिका : सुश्री ज्योती रानडे  ☆ प्रस्तुती – सौ. गौरी गाडेकर

राधाबाईंकडे आज खूप गडबड होती. त्यांच्या लेकीला, कलावतीला बघायला लोक यायचे होते. चार खोल्यांचं घर लखलखीत स्वच्छ करून झालं होतं. बाहेरच्या हॅालमध्ये त्यांचे यजमान, किर्तनकार वामनराव, येरझारा घालत होते. वामनरावांचं किर्तन म्हणजे आयुष्य कसं जगावं याचा धडाच असे पण आज ते स्वत:च थोडे काळजीत होते!

“अहो, मुलाचे वडील प्रसिध्द डॅाक्टर आहेत पण फार रागीट आहेत असं ऐकतोय. काणे मंडळी आहेतच म्हणे रागीट. ” ते पत्नीस म्हणाले.

“हे बघा, योगेश फार चांगला आहे मुलगा हो.. आई प्रेमळ आहे. असेनात का वडील रागीट.. आपली कला शहाणी आहे.. घेईल सांभाळून. ” राधाबाई समजावणीच्या सुरात म्हणाल्या.

“रामकृष्ण हरी.. रामकृष्ण हरी” वामनराव त्याच्या नकळत जपात हरवून गेले. या राधेची सकारात्मक वृत्तीच आपली शक्ती बनून आयुष्यभर पुरली होती हे त्यांना परत एकदा जाणवलं!

कलावती तयार होऊन बाहेर आली. ते सात्विक सौंदर्य व त्या मासोळीसारख्या काळ्या डोळ्यातील बुध्दिमत्ता बघून राधाबाई धन्य झाल्या. वामनरावांनाही भरून आलं..

मोतिया रंगाच्या साडीत कलावती किती सुंदर दिसत होती! हिरवेकंच मोरपीसाच्या नक्षीचे काठ, हातात मोत्याची एक एक बांगडी, कानात भोकरं, आणि गळ्यात मोत्याचा सर घातलेली कलावती अप्रतिम दिसत होती. संस्कृत मधे डॅाक्टरेट करत असलेली सुसंकृत लेक आमची! या हिऱ्याला उत्तम कोंदण मिळवून दे रे श्रीहरी.. म्हणत वामनरावांनी श्रीकृष्णाच्या प्रतिमेसमोर हात जोडले..

अंगणात विठूकाका काम करत होता. त्यांनी पण खिडकीतून तर्जनी व अंगठा जोडून छान दिसतेस असं कलावतीला सांगितलं व ते परत बाग नीटनेटकी करू लागले.

कलावतीनं अबोलीच्या फुलांचा सुरेख गजरा केला होता तो आईच्या केसात माळला..

“कले.. अग मला म्हातारीला कसला गजरा घालतेस? तू घाल ना! “ राधाबाई लटक्या रागाने म्हणाल्या.

“घाल ग! गोड दिसत आहेस! ”कलावतीला आईला चिडवल्याखेरीज चैन पडत नसे!

“आवरा, आवरा पटकन! ” वामनरावांनी उठून हॅालमधील आकाशी पडदा सरळ केला. बैठकीच्या गादीवरचे लोड सरळ केले. रामकृष्ण हरी जप करत त्याच्या खुर्चीवर बसले.

बेल वाजली.. मंडळी आली. उंच्यापुऱ्या, देखण्या योगेश कडे बघून वामनराव व राधाबाई खुष झाले. योगेश इंजिनीअर होऊन एका बड्या कंपनीत काम करत होता. त्याचे वडील डॅाक्टर काणे शहरातील प्रसिध्द डॅाक्टर होते. आई शांत व सौम्य दिसत होती.

हवा पाण्याची बोलणी झाली. हॅाल मधे घातलेल्या साध्या सतरंजीकडे बघताना त्यांच्या डोळ्यात तुच्छता तरळून गेली असे वामनरावांना वाटून गेले..

”तुमचं किर्तन कधी ऐकलं नाही कारण मला वेळच नाही कुणाची किर्तनं ऐकायला.. पण काय हो.. किर्तन करून पोट भरणे मला तरी कठीण वाटतं. ” डॅा. काणे वामनरावांकडे बघत म्हणाले.

माणसाच्या वैभवाच्या व्याख्या घर, गाडी, बंगला यापर्यंतच सीमित आहेत हे जाणवून वामनराव मंद हसले.

एकमेकांच्या अंतरीच्या वैभवाकडे बघायला कधी शिकणार? कालच्या निरूपणाचा हाच विषय होता.. अंतरीचे अमृत..

“आम्हाला डॅाक्टर मुलगीच हवी होती पण आमचे युवराज तुमच्या लेकीला भेटले म्हणून आम्ही आज इथे येऊन पोचलो आहोत. बोलवा तुमच्या मुलीला. ” डॅा. काणे गुर्मीत म्हणाले.

कला बाहेर आली.. तिच्याकडे बघून योगेशचा खुललेला चेहरा खूप काही सांगून गेला! तिनं केलेलं मेघदूताचं रसग्रहण ऐकायला गेल्यापासूनच ती त्याच्या मनात भरली होती. आषाढस्य प्रथमदिवसे.. नं तिनं केलेली सुरूवात व महाकवी कालिदासाच्या वाड्ग्मयावरचं तिचं प्रभुत्व बघून तो थक्क झाला होता. तिच्या साधेपणातलं सौंदर्यच त्याचा पाठपुरावा करत त्याला तिच्या घरी घेऊन आलं होतं.. पण आज बाबा कसे बोलतील आज याची त्याला फार काळजी होती.

“वामनराव, जगन्नाथ शंकरशेट शिष्यवृत्ती मिळवणारे तुम्ही.

किर्तनाऐवजी काही दुसरं का केलं नाहीत? ” काणे म्हणाले. वामनराव “देवाची इच्छा.. तो ठरवतो.. म्हणाले पण काणे काही पाठ सोडायला तयार नव्हते.

कलावतीला काण्यांचे प्रश्न खटकत होते… रामदासी किर्तनाने पंचक्रोशी पवित्र करणाऱ्या माझ्या संत प्रवृत्तीच्या बाबांबद्दल यांना थोडाही आदर नाही हे तिला दिसत होतं पण योगेश ते प्रश्न ऐकून इतका गप्प कसा बसतो आहे हे तिला कळतं नव्हतं.

खिडकीतून विठूकाकांनी मुलगा छान आहे असं दाखवलं व ती खुदकन् हसली. विठूकाका तिच्या जन्मापासून त्यांच्याकडे येत असतं.. किर्तनाला येणारे एक साधक! पण वामनबुवांसाठी आपण काहीतरी करावं ही प्रबळ इच्छा! ते येत व बगीचा सुंदर करून जातं. कधी बुवांशी चहा घेत गप्पा मारत तर कधी कलावतीला बागकाम शिकवतं..

डॅा. काणे कलावतीला म्हणाले, ”संस्कृतचे क्लास तुम्ही घेऊ शकता. उठून बाहेर कुठं जाऊन नोकरी करायची जरूर नाही. ” ते योगेशला काही बोलूच देत नव्हते म्हणून वामनरावच म्हणाले, ”कला, योगेशना बाग दाखव ना आपली! ”

ते दोघे बाहेर गेले. योगेश चांगला मुलगा होता. वडिलांपुढे मात्र एक अक्षरही मायलेक बोलू शकत नाहीत हे कलेला जाणवले. त्यांनी काहीवेळ गप्पा मारल्या व राधाबाईंनी चहा प्यायला आत बोलावले म्हणून ते आत गेले.

कला म्हणाली, “ अहो विठूकाका, आत या ना चहा प्यायला! ”

डॅा. काणे चहाचा कप हातात घेऊन बाग पहाण्यास दाराकडे वळत असतानाच आत येणाऱ्या विठूकाकाला धडकले व चहा धक्का लागून त्यांच्या शर्टावर सांडला..

“Nonsense! “ ते काकांकडे रागाने पहात ओरडले. काका बिचारे हातातल्या फडक्याने चहा पुसू लागले पण योगेशचे बाबा ओरडले, “ते घाणेरडं फडकं माझ्या कपड्यांना लावू नको. दिसत नाही हातात चहा आहे माझ्या? ” काका शरमिंदे होऊन खाली बघत उभे राहिले..

कलावती एकदम उभी राहिली. ती काण्यांकडे बघून म्हणाली, “तुमचा चहा सांडला का? ”

“हो मग! ” हा गावठी माणूस येऊन धडकल्यावर आणि काय होणार?

कलावती हसली.. “नाही डॅाक्टर साहेब! तुमचा चहा सांडला कारण तुमच्या कपात चहा होता. तुमच्या कपात जर कॅाफी असती तर कॅाफी सांडली असती! बरोबर ना? ”

डॅाक्टर काणे चिडून म्हणाले, ”यात विशेष काय सांगितलंस? जे कपात आहे तेच सांडणार.. का पाणी सांडेल? ”

“आपण मोठे डॅाक्टर आहात.. बरोबर आहे.. जे आत आहे तेच बाहेर सांडणार! आयुष्यात असे अनेक धक्के बसणार आहेत.. परिस्थितीचे, नातेसंबंधांचे.. आणि आत जर विवेक, नम्रता, कृतज्ञता असेल तर त्या धक्क्यांनंतरही हे गुणच बाहेर सांडतील.. पण..

आपल्या आतच जर तुच्छता, अहंकार, क्रोध असेल तर तेच बाहेर पडणार ना.. ज्याचा मला गेले दोन तास त्रास होतो आहे..

.. योगेश मला आवडला आहे. पण आपल्यापुढे तो काही

बोलू शकत नाही.. त्याच्यात नम्रता आहे.. माझ्या आई बाबांबद्दल आदर आहे आणि आपले बाबा आज कसे बोलतील ही काळजीही आहे. ते मला बाहेर अंगणात समजलं म्हणूनच मला तो अजूनच आवडला..

पण भारतीय समाजात लग्न होतं तेव्हा ते दोन कुटुंबांचं असतं. आमचं लग्न झालं तर माझे किर्तनकार बाबा आपले व्याही होणार याचा तुम्हाला त्रास होईल. ते व्यवहाराच्या दृष्टीनं आपल्या तोलामोलाचे नाहीत.. पण ज्ञानाच्या बाबतीत त्यांची कोणी बरोबरी करू शकणार नाही..

मी घरात संस्कृतचे क्लास घेणार नाही.. मी विद्यापीठांत जाऊन संस्कृत शिकवणार आहे.. मी पण डॅाक्टरच होत आहे पण कालिदासाच्या वाड्ग्मयावर! रघुवंशातील भाषा थोडी कृत्रिम का वाटते व मेघदूत मनाला का भिडतं हे विद्यार्थ्यांना शिकवणारी..

आणि हे आमचे विठू काका आहेत ना त्यांचा मान राखणारं घरच मला हवं आहे.. तिचे डोळे भरून येऊन आवाज कापरा झाला होता..

बरं झालं की आत जे असतं तेच बाहेर सांडतं.. निदान मला कळलं तरी.. योगेश तू जेव्हा डॅाक्टर साहेबांना सांगू शकशील ना.. बाबा तुमचं आज चुकलं किंवा बरोबर आहे त्यादिवशी येऊन माझा हात हातात घे. ” ती थांबली!

डॅाक्टर काणे जळजळीत नजरेनं बायको व मुलाकडे बघत म्हणाले, “ चला इथून.. खालच्या दर्जाच्या लोकांशी नातं नाही जोडायचं आपल्याला. ” ते तावातावानं बाहेर पडले.. त्यांची पत्नी दु:खी चेहऱ्याने बाहेर पडताना बघून योगेश म्हणाला, “आई, थांब. मला कलावती पसंत आहे. मी तिच्याशीच लग्न करणार आहे! ”

आईनं प्रेमाने कलावतीला जवळ घेतलं आणि वामनराव व राधाबाईंना त्या म्हणाल्या, “सुसंकृत आहे मुलगी असं ऐकलं होतं पण आज “सुसंकृत” म्हणजे काय समजलं”!

कलावती व योगेश नजरेत नजर घालून तो क्षण अनुभवत उभे होते. बाहेरून डॅाक्टर काणे गाडीचा हॅार्न वाजवत होते पण काही वेळात थांबले.. आत असलेलं सारंच बाहेर सांडून जगाला दिसू नये म्हणून!

कलावती हॅार्न थांबलेला बघून मनातच हसली. आयुष्य मोकळा कप देतं.. तो कशानं भरायचा हे आपल्या हातात आहे या विचारात असताना योगेशनं तिचा हात हातात घेतला व अंगठी पुढं केली..

वामनराव रामकृष्ण हरी.. म्हणत स्मितहास्य करत डॅाक्टरांना आत बोलवायला बाहेर गेले.. खरेच सुसंकृत होते म्हणूनच!!

लेखिका : सुश्री ज्योती रानडे.

प्रस्तुती : सौ. गौरी गाडेकर 

संपर्क – 1/602, कैरव, जी. ई. लिंक्स, राम मंदिर रोड, गोरेगाव (पश्चिम), मुंबई 400104.

फोन नं. 9820206306

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ “हुंदका…” ☆ प्रा. भरत खैरकर☆

प्रा. भरत खैरकर

🌸 जीवनरंग 🌸

☆ हुंदका… ☆ प्रा. भरत खैरकर 

‘आपली गुड्डी आता बरीचशी मोठी दिसते! तिला आठवण वगैरे येत नाही.. कारण आम्ही तिची खूप काळजी घेतो.. “दिदी तेरा देवर दिवाना” ह्या गाण्यावर ती चांगली हातपाय हालविते आणि तोंडाने तोतरे बोल काढून नाचायला लागल्यावर साऱ्यांच्या कौतुकाचा विषय बनते! आम्ही सर्वजण म्हणजे मी, गुड्डी आणि ‘हे’ होळीला बैतुलला येणार आहोत. तुम्हीही या. भेट तिथेच होईल.

आपलीच 

अलका. ‘

नारायणची ही मागील १५ मिनिटांपासून पत्र वाचायची तिसरी वेळ होती. त्यानं चौथ्यांदा वाचायला सुरुवात केली, तर बाहेर कसलासा आवाज आला. दोन पोरं कंपाऊंडच्या आतल्या ताराचा बंडल काठीने ओढत होते. त्याने दरवाज्यात ठेवलेली काठी संपूर्ण ताकतीने त्या पोट्ट्यांच्या दिशेने भिरकावली. पोरं तार टाकून पळाली.

आता त्याचं मन मात्र पत्रात लागत नव्हतं. कारण तो नुकत्याच गेलेल्या पॅसेंजर गाडीने येणाऱ्या शंकरची वाट पाहत होता. तो मागच्या आठवड्यात, जो गेला तो अजूनही आला नव्हता. आणि आजच्या पॅसेंजरने येतो असं त्यांना सांगितलं होतं. परवाची होळी असल्यामुळे आजच जब्बार सुद्धा उद्या येतो. म्हणून त्या आत्ताच्या पॅसेंजरने गेला होता. पण शंकर परतला नव्हता. तो आलाच नाही.

रेल्वे खात्यात नारायण ठेकेदारीत काम करायचा. शंकर, जब्बारही त्याचे सहकारी होते. ब्रॉड गेजचं काम सुरू असल्याने लाखो रुपयांच सामान शेडमध्ये नि शेडच्या कंपाउंड मध्ये पडलेलं होतं.. त्याची राखण करण्यासाठी सेक्युरिटी म्हणून तीन शिफ्ट मध्ये तिघं काम करत होते आणि एक जास्तीचा होता. शंकर मात्र मागच्या आठवड्यात गेला तो अजून उगवलाच नव्हता. त्यामुळे शंकरची ड्युटी नारायण, जब्बार आळीपाळीने करीत होते.

हे इतकं महागडे सामान आपण दोन- दोन, तीन तीन दिवट्या लागोपाठ करून राखायचं म्हणजे जिकरीचं काम आहे. थोडसं झोपतो म्हटलं तरी बाजूच्या झोपडपट्टीतील पोट्टे काही ना काही पळवायला तयारच असायचे! त्यामुळे नारायण जरा चिडला होता. त्यातल्या त्यात हे पत्र वाचून त्याला ‘कधी गावाला जातो आणि कधी नाही! ‘ असं वाटत होतं.

पण शंकर यायला हवा.. शंकर तर गोंड आहे! त्यांच्यामध्ये होळी आणि दसरा खूप जोशात मनवतात मग दोन दिवसांवर होळी असताना तो येईलच कसा? ह्या विचाराने मात्र शंकरचा नारायणला खूप राग आला. ‘सालं, आपण किती दिवस झाले बैतूलला गेलो नाही. ह्यांचं काय ह्यांना रोज रोज घरचे लोक भेटतात. मला कुठे तसे? धड आठवड्यातून एकदा तरी भेटता येत नाही. रेल्वेशी संबंधित म्हणून बरं! साहेब लोक तिकीट तरी विचारीत नाही. मागे असंच ह्यांच्या अशा सुट्ट्या मारण्याने आपण गावाला जाणार.. पण गेलो नाही. बायकोने तिच्या भावाला अजनी हेडक्वार्टरला ‘कां आले नाही? ‘ म्हणून चौकशी करायला पाठवलं तिथून तो इथे साइटवर भेटायला आला होता.. ह्या खेड्यात.. किती समजावून सांगावं लागलं होतं त्याला आणि हे मस्त उद्या येतो म्हणून चार चार दिवस गायब होतात.. मी तक्रार करीत नाही याचा अर्थ असा थोडीच होतो.. आता मी जर उद्या गावाला गेलो नाही तर काय वाटेल घरच्यांना.. बाबा घरचा कर्ता माणूसच लगोलग कळवून सुद्धा आला नाही! आणि आपल्या लहान भावाला काय वाटेल? तो तर तेवढ्या लांबून डेहराडून वरून येतोय.. सोबत अलका येणार आहे.. गुड्डीला घेऊन.. लग्न झाल्यावर आपली त्याच्याशी भेटत नाही.. सालभर झालं बहुदा.. अलकाच्या लग्नात आपली गुड्डी केवढीशी होती. धड तिचं दूधही सुटलं नव्हतं.. तर अलकानं आपल्या बायकोकडून तिला मागून नेलं होतं.. ‘आम्हांला करमणार नाही म्हणायची… शेखर ड्युटीवर गेला की तिला कॉर्टरवर गुड्डीची साथ मिळणार होती.. आपण ह्यांचं नुकतंच लग्न झालंय कशाला मध्ये गुड्डी.. वगैरे पाठवायला नको.. म्हणून ‘नाही नाही ‘म्हटलं तरी रडून रडून तिला नेली होती.. शेखरही हट्टाला पेटला होता. शेखरचा हट्ट आपल्याला कधीच मोडवत नाही मग आपणच गुड्डीला त्या दोघांच्या स्वाधीन केलं होतं..

शेखर किती लहान होता. तेव्हाच आपले बाबा वारले होते. मधल्या भावाने बैतुलला एमआयडीसीत नोकरी पकडली होती. तिथे बायकोसह स्थायिक झाला होता. त्यामुळे शेखरच शिक्षण, आईचा सांभाळ आणि आपली नोकरी एवढं सगळं सांभाळाव लागायचं आपल्याला! तेव्हाचा आपला पगार फक्त दीडशे रुपये होता आता शेखरला एकदम साडेपाच हजार रुपये पगार आहे. आईच्या मताचं ऐकलं असतं तर शेखर आज मिलिटरीत नसताच!!

बैतुलला त्यावेळी मिल्ट्री कॅम्प लागला होता. शेखर सकाळी तिथे दूध पोचवायचा. आपल्यापेक्षा तो धट्टाकट्टा वाटायचा. एक दिवस त्याच्या पेपरमुळे आपण दूध द्यायला गेलो तर मिलिटरीच्या साहेबांनी शेखर विषयी विचारून त्याला मिल्ट्रीत टाका असं म्हटलं. मी किती समजूत घालून शेखरला मिलिटरीत टाकला. आता पाहता पाहता त्याच सातव वर्ष सुरू आहे मिलिटरीतलं! मागच्या वर्षी त्यानं लग्न केलं. अलका सारखी सोज्वल भाऊसून मिळाली.. शेखरला पाहिजे होती अगदी तशीच ती आहे. आणि आता ते सर्वजण होळीला येणार आहे.. मी येथे अडकून पडलो एकटा.. ‘ नारायणला हे सारं आठवून आठवून हुंदका दाटून आला. तो बिछान्यावर आडवा पडला.. तर लगेच बाहेर पुन्हा कसला तरी आवाज आला.. नारायण चिडला.. त्यान पुन्हा काठी उचलली आणि बाहेर आला.. तर दरवाजा उघडून शंकर आत येत होता. त्याला पाहून नारायणचा दाटलेला हुंदका अश्रूच्या रूपाने बाहेर पडला..

© प्रा. भरत खैरकर

संपर्क – बी १/७, काकडे पार्क, तानाजी नगर, चिंचवड, पुणे ३३. मो.  ९८८१६१५३२९

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ मौनातील आकांत… ☆ डॉ. शैलजा करोडे ☆

डॉ. शैलजा करोडे

🌸 जीवनरंग 🌸

☆ मौनातील आकांत… ☆ डॉ. शैलजा करोडे

“सोहम ऊठ बेटा. बघ सकाळचे पाच वाजलेत. मोबाईलचा हा अलार्म दुसर्‍यांदा होतोय बेटा. ऊठ आता. आळस करून कसा चालेल. ऊठ, फ्रेश हो, आणि थोडावेळ कर अभ्यास. सकाळी सकाळी अभ्यास केला तर माईंड फ्रेश असतं, सकाळची शांत वेळ असते, गडबड, गोंधळ, गजबज, विशेष म्हणजे ध्वनी प्रदूषण नसतं. अशा शांतवेळी अभ्यास केला तर लक्षातही राहातो बेटा. हे सगळं तुझ्या भल्यासाठीच सांगतेय राजा. यंदा तुझं दहावीचं वर्ष. यातील तुझी शैक्षणिक प्रगती, गुणसंख्येवर तुझं भविष्य अवलंबून आहे. थोडक्यात काय तर आयुष्याला कलाटणी देणारं हे वर्ष आहे. तुझ्या जीवनाला दिशा देणारं हे वर्ष आहे. बेटा आजकालच्या परीक्षा या गळेकापू स्पर्धेसारख्या आहे. मेडिकल, इंजिनिअरिंगला किती हाय परसेंटवर कटआँफ होतोय, पाहातोय आपण. दहावी हा बारावीचा पाया आहे बाळा. चल ऊठ बरं आता. आळस हा वाटणारच. थोडावेळ होईल तसं. मस्त स्नान कर. बघ निंबाची पानं टाकली आहेत पाण्यात. चांगला सुगंधी साबण ठेवलाय. स्नान केल्यानं सगळा आळस दूर होईल तुझा. तोपर्यंत मी मखाणे, काजू, बदाम मिश्रीत दूध तयार करते “

आईचं एवढं मोठं लेक्चर ऐकल्यानंतर सोहमला उठणं भाग होतंच, तरीही त्याने आपली नाराजी व्यक्त केली. ” काय माॅम झोपू देत जा ना मला थोडावेळ. रात्री अभ्यास केलाय मी. अभ्यासाचं वेळापत्रक बनवलं आहे मी. मलाही काळजी आहे परीक्षेची. “

” बरं बरं, चल आता. चर्चा नको. मलाही घरातली सगळी कामं उरकून ऑफिसला जायचंय. तुझे पप्पाही उठतीलच एवढ्यात. बाळ माझा शहाणा ” म्हणत मी सोहमची पप्पी घेतली.

सोहमला बाथरूमला पाठवून मी किचनकडे वळले. गॅसवर एकीकडे सोहमचं दूध, दुसर्‍या शेगडीवर आमचा चहा, तिसर्‍या शेगडीवर फोडणीला टाकलेली भाजी. माझा सर्कसचा रोजचा शो सुरू झाला. सर्कसही तीच, प्रेक्षकही तेच, कलाकारही मीच, पण रोज नवनवीन आयटेम सादर करावे लागायचे, सणवार, व्रतवैकल्य, पावणा रावळा, दुखणी खुपणी, सगळेच गेम करावे लागतात. जीवनाच्या नवनवीन वाटेवरुन चालतांना जुनेही सोडता येत नाहीत. मग काय सर्कशीत कपबशीचा खेळ असतो. तसा दोरीवर ताल धरत संसाराचा बॅलन्स साधायचा.

“ मनाली, चहा झालाय का? “ राकेश किचनमध्ये डोकावत बोलले. ” होय, हा घ्या. ” मी राकेशच्या हाती चहा सोपवून सोहमला दूध देण्यासाठी वळले, ” आण दे मला मनाली. मी नेऊन देतो. “

” सोहम, हे घे दूध. अभ्यास कसा काय चालू आहे बेटा. तुला काही नवनवीन पुस्तकं, संदर्भ ग्रंथ पाहिजेत काय? काही शैक्षणिक साहित्य पाहिजे काय? काही आता सुरु असलेल्या क्लासेस व्यतिरिक्त आणखी दुसरी काही मदत हवी काय? हवं ते माग? मी कशाला नाही म्हणणार नाही. पण तू चांगला अभ्यास कर. गुणवत्ता यादीत नाव झळकू दे. मेडीकलला प्रवेश मिळू दे. जी स्वप्न मी पाहिली होती, ती तू पूर्ण कर. कारण मला अशा शैक्षणिक सुविधा मिळाल्या नाहीत. मिळणारही नव्हत्या. कारण घरची परिस्थितीच गरीबीची. बाबा एकटे कमावणारे, खाणारी चार तोंडे, आम्ही भावंडही शाळा सुटल्यावर छोटी मोठी कामं करत होतो, तरीही सगळा पैसा पोटभरी पुरताच असायचा. मग इतर खर्च कसा करणार, सगळा आनंदी आनंद, होय आनंदच. आनंदी आनंद गडे, जिकडे तिकडे चोहीकडे ” असू दे. पण मी तुला कमी नाही पडू देणार.

 सोहमने एक बारकासा कटाक्ष पप्पांकडे टाकला. मान हलवूनच होकार दिला. काही बोलू मात्र शकला नाही. कारण त्याचं कोण ऐकून घेणार. त्याला तर मम्मी व पप्पांची स्वप्न पूर्ण करायची होती. डाॅक्टर नाहीतर इंजिनियर व्हायचं होतं. मेरीटमध्ये यायचं होतं, स्पर्धेत पुढे जायचं होतं, धाव धाव धावायचं होतं.

 त्याला मात्र वकील व्हायचं होतं, समाजातील अन्यायाविरूद्ध लढायचं होतं. न्याय देवतेची कास धरून, न्याय हक्कांसाठी लढून सामाजिक समता साधत एका निकोप प्रगत समाज निर्मितीला हातभार लावायचा होता. आणि यासाठी काही त्याला मेरीटमध्ये यावं लागणार नव्हतं. साधी कला शाखेतील पदवी घेऊन पुढे लाॅ ग्रॅज्युएशन तो करू शकणार होता. पण नाही त्याला मम्मी पप्पांचं ऐकावचं लागणार होतं. त्याचं मन काही सांगत होतं तर प्रत्यक्षात वेगळ्या वाटेवर चालायचं होतं, त्याचा हा आकांत मौनातच दाबल्या जात होता.

धावपळ करत मी आँफिस गाठलं आणि फाईलींच्या डोंगरात स्वतःला झोकून दिलं. विधानसभेचं पावसाळी अधिवेशन सुरु होतं. कामाचा प्रचंड ताण होता. पाहिजे ती माहिती तत्क्षणी पुरवावी लागत होती. सगळं हाताशी तयार ठेवावं लागत होतं. ” मनाली मॅडम उद्या सर हाऊसमध्ये लक्षवेधी मांडणार आहेत. सगळी तयारी चोख आहेना. ” ” होय सर” ‘ गुड ‘

सायंकाळी धावतच स्टेशन गाठलं. प्लॅटफाॅर्मवर येताक्षणीच लोकलने हाॅर्न दिला. अगदी फ्रॅक्शन आँफ सेकंदचा फरक पडला असता तर मी खालीच पडले असते. माझ्या मैत्रिणींनी मला वर खेचले होते. ‘ जाऊ द्यायची होती ना ही ट्रेन मनाली. ” ” अग, सोहमचं हे महत्वाचं वर्ष. ही ट्रेन चुकली असती तर आणखी अर्धा तास लेट झालं असतं ” ” काय ग दिपाली तुझ्या मनोजचा कसा काय चालू आहे अभ्यास ” ” अग प्रकाश इंस्टीट्यूशन हा नामांकीत संस्था. चांगली तयारी करवून घेतात. सराव परीक्षाही वारंवार घेतल्या जातात, त्यामुळे मुलांच्या प्रगतीचा आलेखही कळतो. “

‘ माझ्या मोहनला तर या युनिट टेस्टला सर्वाधिक गुण मिळाले ‘ चैताली सांगत होती. मग एकेक जणी आपल्या मुलांचा अभ्यास, त्याचं नियोजन, टि. व्ही पाहण्यावर बंदी, काहींनी तर केबलचं काढून ठेवल्या होत्या. तब्येत चांगली राहावी म्हणून खाण्यावरही कसं बंधन ठेवलं जातंय इ इ इ

मी लॅचकीने दरवाजा उघडला. सोहमच्या रुममध्ये डोकावले. ” मम्मी आलीस, ये ना, जरा बस माझ्याजवळ ” ” होय राजा, जरा फ्रेश होऊन येते ” मी फ्रेश झाले. ” सोहम असं कर ना बेटा, तुच किचनमध्ये ये, म्हणजे माझा स्वयंपाकही होईल आणि तुझ्याशी बोलताही येईल. ” ” ठीक आहे मम्मी ” सोहम किचनमध्ये आला. तो बोलणारही तेवढ्यात डोअरबेल वाजली. दूधवाला आला होता. मी दूध घेऊन किचनमध्ये आले तोपर्यंत कढईत फोडणीसाठी टाकलेले तेल बरेच तापले होते. साहजिकच माझे लक्ष त्यात लागले. भाजी फोडणी घालत नाही तोच पुन्हा डोअरबेल वाजली. समोरच्या फ्लॅटमधील स्वामीनाथन आंटी नात झाली म्हणून मिठाई घेऊन आल्या होत्या. सोहमचं बोलणं राहूनच गेलं, तो आपल्या रूममध्ये निघून आला.

” सोहम बाळ, आज मी तुझ्या रूममध्ये झोपेन तेव्हा बोलू आपण “

सोहमच्या रूममध्ये मी झोपले, सोहमने बोलायला सुरूवातही केली पण झोपेने माझ्यावर अंथरूणावर पाठ टेकताक्षणीच विजय मिळवला.

आजकाल सोहमचं जेवणही कमी झालं होतं. अभ्यासात त्याचं फारसं मनही लागत नव्हतं. चेहराही निस्तेज झाला होता. ” सोहम बरं नाही वाटत काय तुला. ” ” नाही मम्मी तसं काही नाही ” ” तरी एकदा जाऊन येऊ बेटा. काही त्रास असेल तर डाॅक्टर काही औषधं देतील. तसं काही नसेल तर चांगलंच आहे आपल्यासाठी ” ” ठीक आहे मम्मी “

डाॅक्टर देशपांडेनी सोहमचं चेकअप केलं. ” व्हेरी गुड यंग बाॅय, काही झालेलं नाही तुला. खायचं, प्यायचं, मजा करायची, अभ्यासाचं टेन्शन घ्यायचं नाही, ओ के. आता थोडावेळ बाहेर थांब. मी मम्मी पप्पांशी बोलतो ” 

” बोला डॉक्टर काय झालं सोहमला ” ” ताण. ताण आलाय परीक्षेचा. घुसमटतोय तो आतल्या आत ” ” पण कशामुळे ” ” तुम्ही काही प्रेशर दिलंय काय त्याला परिक्षेतील टक्केवारीच कि इतर आणखी काही ” ” डाक्टर, आम्हांला वाटतं त्याने डाक्टर / इंजिनियर व्हावं, मग टक्केवारी आणि त्यासाठी जीवतोड मेहनत येणारच ना. आम्ही त्याला काही कमी पडू देत नाही आहोत. पण अभ्यास तर त्यालाच करावा लागणार आहे ना ” ” तुम्हांला वाटतं त्याने डाक्टर व्हावं, त्याला काय वाटतं हे कधी विचारलं” ” त्याला काय विचारायचं. ज्या सुविधा आम्हांला मिळाल्या नाही, त्या सर्व आम्ही त्याला पुरवतोय. आणि आमची स्वप्न आम्ही पूर्ण करू शकलो नाही, ती स्वप्न आम्ही मुलात पाहिली तर चुकलं कोठे. ” ” इथेच गल्लत होतेय महाजन सर, त्याने स्वतःची स्वप्न बाजूला ठेवून तुमची स्वप्न पूर्ण करायची. आणि त्याची स्वप्न काय पुढे त्याच्या मुलाने पूर्ण करायची. आणि ही साखळी अशीच पुढे न्यायची. नका थोपू आपली मतं मुलावर. घेऊ देत त्याला मोकळा श्वास, मग बघा अवकाशात कशी उंच भरारी घेतो ती “

” ओ के डाॅक्टर. घेऊ आम्ही ती काळजी “

रात्रीची जेवणं आटोपून मी टी. व्ही लावला. बातम्यांचं चॅनेल लावताच मोठी धक्कादायक बातमी समोर आली ” नीटच्या सराव परिक्षेत कमी गुण मिळाल्याने बापाची मुलीला बेदम मारहाण. मारहाणीत मुलीचा मृत्यू. सांगली जिल्हातील आटपाडी तालुक्यातील घटना. बातमी पाहाताच माझं व राकेशचं तर धाबचं दणाणलं.

” मनाली उद्या बोलू सोहमशी शांततेने. ” ” होय “

मोबाईलने सकाळी पाच वाजेला अलार्म देऊनही आज आईने उठवले नाही. सोहम आश्चर्यचकित झाला. तोच आता हडबडून उठला. ” साॅरी मम्मी, उठायला उशीर झाला ” 

” अरे झोप, झोप, काय घाई आहे “.

एवढ्यात पप्पाही आले. ” सोहम बाळा झाली झोप. नसेल बरं वाटत तर कर आराम ” 

” नाही, बरं वाटतंय मला. ” 

” O k. good ” 

” सोहम तुला माझ्याशी काही बोलायचं होतं ना ” 

” होय मम्मी. ” 

‘ मग बोल आता ‘ 

” मम्मी पप्पा मला डाॅक्टर / इंजिनियर नाही व्हायचं तर एक निष्णात वकील बनून अन्यायाविरूद्ध लढायचं आहे. सत्याची बूज राखायची आहे. गोर गरीबांना न्याय मिळवून देऊन एका निकोप व सुदृढ समाज निर्मितीसाठी हातभार लावायचा आहे. एक उत्तम नागरिक बनायचं आहे “

“ Then go ahead my son ” 

” खरंच पप्पा ” 

” अगदी खरं, माझी व मम्माचीही परवानगी आहे. ” 

” Oh my sweet pappa. Oh my sweet mammy. my sweet, sweet, sweet & lovely parents. thank you very much. I love you. ” 

” We both also love our sweet son “

सोहम आनंदात बाथरूममध्ये दात ब्रश करण्यासाठी गेला. एका मौनातील आकांताला आज out let मिळालं होतं … सगळा निचरा झाला होता. मनावरील मळभ जाऊन आता स्वच्छ उजाडणार होतं

© डॉ. शैलजा करोडे

नेरुळ नवी मुंबई मो. 9764808391

ईमेल – karodeshailaja@gmail.com 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ गजरा… ☆ सौ. प्रांजली लाळे ☆

सौ. प्रांजली लाळे

? जीवनरंग ?

☆ गजरा… ☆ सौ. प्रांजली लाळे

“अजूनही तो सुगंध सुखावतो रे.. माझ्या मनी जपून ठेवलेला तो दरवळ रोमांच फुलवतो.. त्याचं ते परसदारी असणंही किती सुखावह होतं.. दरवळ त्याचा मनी अजूनही डोकावतो. “

राधा बाहेरच्या उंच गगनचुंबी इमारती न्हाहाळत आरामखुर्चीत बसली होती. गॅलरीतुन हा व्ह्युव तिला अधिक मागे न्यायचा. सिमेंटच्या जंगलात सगळं आहे. पण तो ओलावा हरवलाय.. हम्म्.. मनाशीच खंतावत ती बडबडली.. श्यामराव खाली फेरफटका मारायला जायचे.. हिला मात्र जमायचं नाही खाली उतरायला. गुडघे साथ नव्हते देत हल्ली.. पण संध्याकाळी चहा, स्वयंपाक तिलाच करावा लागे. सुनबाई थकून यायची. तिलाही सहकार्य अपेक्षित होतं.. दोघी मिळून छान काही तरी बनवायच्या.. आठव्या मजल्यावरचं घर.. थंड हवा.. छान होतं सर्व.. पण मनात कुठंतरी सलत होतं हल्ली..

सकाळी सहालाच जाग यायची राधाला.. तिला उठलं की आधी चहा लागे.. श्यामरावही तिच्या पाठोपाठ उठून चहा घ्यायला तयार असत.. पावसाळा सुरू होता. मस्त अदरकवाली चाय बनाओ.. श्यामराव चेष्टेने म्हणाले.. पण राधा भूतकाळात रमलेली.. तिला आठवत होते तिचे जुने घर.. सडा संमार्जन करुन झाले की आन्हिके उरकायची. श्यामराव टेपरेकॉर्डर लावून लता दिदींचं सुरेल आवाजातलं ‘मोगरा फुलला’ लावायचे. नुकतीच उन्हाळ्यातली सुट्टी संपत आलेली असायची.. मुलं तरीही सुट्टीचा आनंद घेत पहुडलेली असायची. दोन खोल्यांमध्ये का होईना आनंदी होतो आपण!! बाहेर परसदारी मोगरा, जाई जुई, सायली, गुलाब वाटवे फुलवले होते राधेने.. अर्थात श्यामरावही मदत करायचे तिला बागकामात.. उन्हाळ्यात इतर फुले नव्हते येत.. पण मोगरा पुर्ण बागेत राज्य करी.. फुलं तोडून हार करण्याचे काम श्यामराव इमानेइतबारे करत.. एखादा गजरा गपचूप राधेच्या भरगच्च केसात माळत.. हे आठवून आजही राधेला हसू आलं. आजकालच्या वरकरणी प्रेमाच्या जमान्यात, सेल्फी, रिल्सच्या काळात हे प्रेम कुठंतरी काकणभर जास्तच छान होतं. म्हणून ते आजही टिकून आहे.. पण तो मोगरा… हम्म्..

घर सोडून आलो तेव्हा मोगरा परका झाला असेल हे डोक्यात कसे नाही आले आपल्या. पुत्र प्रेमापोटी आपण ते घर, तिथल्या आठवणी सोडून का आलोय?आज त्या घराची प्रकर्षाने आठवण येत होती. डोळ्यात अश्रू तरळले.. रात्री झोपतानाही त्या बागेची आठवण सतत येत राहिली..

सकाळी उठली पण उठताना कण कण जाणवली. श्यामरावांना आवाज दिला. त्यांनी पाहिले तर राधा तापाने फणफणलेली.. मुलांना आवाज दिला.. पटकन पॅरासिटेमल दिली तिला मुलाने.. श्यामरावांना जाणवंल की काही तरी खुपतय हिला.. थोडे बरं वाटलं की बोलुया.. राधा मुलाला वाईट वाटेल म्हणून बोलत नव्हती.. सून मात्र जाणून होती सासूचा स्वभाव. रविवारी सकाळी राधाला सूनबाई म्हंटल्या चला आज जरा जॉगिंगला जाऊया. राधाने आढेवेढे घेत नाही म्हंटले.. पण ती ऐकतेय होय. राधाचा हात धरून लिफ्टने खाली पार्कमध्ये पोहचल्या सुद्धा.. तिच्यासारख्या बऱ्याच जणी तिथे बसलेल्या होत्या. प्रचंड चिवचिवत होत्या. मोकळा श्वास घेत होत्या.. मन मोकळं हसत खिदळत होत्या. हीही त्यांच्यात सामिल झाली.. मन मोकळं हसली. सुनबाई तिथून सटकली. राधाला हायसं वाटत होतं.. खालच्या फ्लोअरवरच्या थत्ते काकूंशी बोलता बोलता मनातलं बोलूनही टाकले तिनं केव्हाचं..

आता असंच रोजचं रुटीन होऊन बसले तिचे. जगण्याला नवीन अर्थ मिळाला तिला..

त्या दिवशी संध्याकाळी सुनबाई ऑफिसमधून आल्या. डोळे झाकले राधाचे.. डोळे उघडले तर समोर राधाचा मुलगा दोन तीन फुलझाडांच्या कुंड्या घेऊन उभा होता.. एका रोपट्याला मोगऱ्याची दोन तीन फुलं आलेली होती.. तो दरवळ घ्राणेंद्रिय आणि मनसुद्धा तृप्त करुन गेला..

…. आता राधेला छान विरंगुळा झाला आहे. तिची आणि श्यामरावांची सकाळ हल्ली मोगऱ्याकडे पहातच उगवते.. दोघेही सकाळचा चहा तिथेच खुर्च्या टाकून घेतात. देवाला वहायला फुलं हल्ली विकत आणावी लागत नाहीत. दुसऱ्या कोणत्या परफ्यूमची गरजच पडत नाही..

© सुश्री प्रांजली लाळे  

मो न. ९७६२६२९७३१

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ श्रीमंती… (अनुवादित कथा) – मूळ इंग्लिश लेखक : अज्ञात ☆ अनुवादक – श्री मकरंद पिंपुटकर ☆

श्री मकरंद पिंपुटकर

? जीवनरंग ❤️

☆ श्रीमंती… (अनुवादित कथा) – मूळ इंग्लिश लेखक : अज्ञात ☆ अनुवादक – श्री मकरंद पिंपुटकर ☆

“काकू, तुमच्याकडे जुनेपाने गरम कपडे आहेत का हो? ” दारात एक ७-८ वर्षांचा मुलगा आणि त्याच्याहून एखाद दोन वर्षांनी लहान मुलगी उभे होते आणि ते मला विचारत होते.

संध्याकाळची वेळ होती, पावसाळ्याचे दिवस होते, अंधारून आलं होतं आणि कोणत्याही क्षणी जोरात पाऊस कोसळणार होता. असा पाऊस आला की आमच्या चाळीतले light हटकून जातात, आणि तसा light जायच्या आधी मला घरातली जास्तीत जास्त कामं उरकायची होती.

मी खरंतर त्यांच्याकडे दुर्लक्ष तरी करणार होते, किंवा त्यांना पुढे जायला तरी सांगणार होते. पण क्षणभर त्यांच्याकडे पाहिलं, तर गारठली होती ती दोघं, फाटके भिजलेले कपडे, ओले केस, चिखलाने माखलेल्या चपलाही तुटलेल्या.

“या रे पोरांनो, आत या. हा टॉवेल घ्या, डोकं पुसा आधी. मी तुम्हाला गरमगरम चहा देते, आलं घालून. “

चपला दाराशीच काढून ती दोघंही निमूटपणे आत आली. दाराशीच उभी राहिली. दाराजवळ स्टुलावरच बसले ते दोघं, एक आणखी स्टूल समोर ओढून मी त्यांच्यासमोर दोन कप चहा ठेवला, बशीमध्ये बिस्किटं ठेवली, आणि मी माझ्या कामाला स्वयंपाकघरात आले.

आजची पुढची कामं, किराणेवाला, दूधवाला आणि बाकी सगळ्यांची द्यायची बिलं हा असे अनेक विचार डोक्यात घोळत होते, पण बाहेरच्या शांततेने माझी विचारमाला तुटली.

मी बाहेर येऊन पाहिलं, चहा बिस्किटं संपली होती, आणि ती छोटी मुलगी हातातल्या रिकाम्या कपाकडे एकटक बघत बसली होती.

अचानक तिनं विचारलं, “काकू, तुम्ही श्रीमंत आहात का हो? “

मला हसूच आलं. संडास बाथरूम common असलेली आमची चाळ, त्यातलं आमचं दोन खोल्यांचं घर, दहा वर्षं होऊन गेली त्याला रंगाचा हातही दिलेला नव्हता, आणि ही छोटुकली पूर्ण गांभीर्याने मला विचारत होती, “काकू, तुम्ही श्रीमंत आहात का हो? “

“नाही ग बाळा. पण असं का विचारते आहेस तू? “

“तुमच्या कपांना कान आहेत, आणि तुमच्या कप आणि बशा मॅचिंग आहेत, ” एखाद्या प्रौढ माणसासारखे observe करत ती म्हणाली.

मी त्यांना काही जुनी पांघरुणं दिली, मुलांचे दोन कपडे दिले, एक बिस्किटांचा पुडा दिला, अचानक मिळालेला हा खजिना घेऊन ती दोघं उड्या मारत निघून गेले, साधे आभार मानायचं भानही राहिलं नाही त्यांना.

पण त्यांनी वेगळे आभार मानायची गरजच नव्हती, त्यांनी मला माझ्या श्रीमंतीची जाणीव करून दिली होती.

माझ्या हातातल्या त्या कपबशीकडे मी नव्याने पाहत होते. कुठल्यातरी आठवडा बाजारात घेतलेल्या साध्या कपबशा होत्या त्या – निळी बॉर्डर असलेल्या पांढऱ्या कपबशा. पण त्या कपांना कान होते आणि कपबशा मॅचिंग होत्या.

ती दोघं गेले, मी स्वयंपाकाला लागले. घरात गॅस सिलिंडर होता, दोन वेळेच्या जेवणाची भ्रांत नव्हती, घराचे कर्जाचे हप्ते फिटत आले होते, नवरोबा निर्व्यसनी होता, कुटुंबाचं पोट भरता येईल आणि सणासुदीला बजेट सांभाळत हौसमौज करता येईल अशी त्याला पक्की नोकरी होती, आमची मुलं गुणी होती, मेहनती होती.

मी श्रीमंत होते.

स्वयंपाक संपला होता, मी बाहेरच्या खोलीत आले, “हे” यायची वेळ होत आली होती, मी देवापुढे दिवा लावला, उदबत्ती लावली, खोली आवरली.

दारात त्यांच्या चपलांच्या चिखलाचे डाग तसेच होते, पण मी ते लगेच पुसले नाहीत.

मी ते नवऱ्याला दाखवणार होते, आणि अभिमानाने सांगणार होते, “आपण श्रीमंत आहोत. “

मूळ इंग्लिश लेखक : अज्ञात 

मराठी अनुवाद : श्री मकरंद पिंपुटकर (स्वैर अनुवाद)

चिंचवड, पुणे.  मो 8698053215

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ वाट चुकलेलं वासरू… — भाग – २ ☆ डॉ. ज्योती गोडबोले ☆

डॉ. ज्योती गोडबोले 

? जीवनरंग ❤️

☆ वाट चुकलेलं वासरू… — भाग – २ ☆ डॉ. ज्योती गोडबोले 

(वीणा सुधीरकडून नवं बळ घेऊन घरी आली. घरी मंजिरीने पिझा मागवला होता. ”आई त्या डिलिव्हरी चे आठशे रुपये देऊन टाक ग”बसल्याबसल्या मंजिरीने फर्मावले. वीणा सरळ आत निघून गेली. वाट बघून फणफण करत मंजिरीने पैसे दिले.) – इथून पुढे —- 

दुसऱ्या दिवशी सकाळी मंजिरी म्हणाली, “ आई, आम्ही मैत्रिणी चार दिवस गोव्याला जातोय. मला पन्नास हजार रुपये लागतील. उद्या भर माझ्या अकाउंटला न विसरता. ”

” मंजिरी, परवडत नसेल तर गोव्याला जाऊ नकोस. माझ्याकडे पैसे नाहीत. , असले तरी मी यापुढे तुला पैसे देणार नाही. अति झालं आता तुझं हे मला ओरबाडणं. तू आता जॉब बघ आणि मिळवायला लाग. मी तुला पोसणार नाही यापुढे. ” वीणा म्हणाली.

मंजिरी रागाने लाल झाली. “ हो का? का देणार नाहीस ग? मीच वारस आहे ना तुमची? मला नाही तर कोणाला देणारेस ही इस्टेट? “ कुत्सितपणे ती म्हणाली.

“ मी तुला आत्ता तर काहीही देणार नाही हे नक्की. नंतरचे नंतर बघू. दोन महिन्यात नोकरी बघायची आणि जागा सुद्धा. परवडत नसेल तर आपल्या जुन्या वाड्यात दोन खोल्या रिकाम्या आहेत तिथे रहायला लाग. पण आता तुझी अरेरावी आम्ही सहन करणार नाही. कान उघडे ठेवून ऐक. “

मंजिरी रागाने लाल झाली. पाय आपटत बाहेर निघून गेली. वीणा शांत होती. यातून काय निष्पन्न होते तेच तिला बघायचं होतं.

संध्याकाळी वीणाच्या दोघी बहिणी भेटायला आल्या.. “ आक्का, अग हे काय? मंजिरी आली होती आमच्याकडे. तू म्हणे तिला घराबाहेर काढणार आहेस? नोकरी कर म्हणालीस म्हणे? एकुलती एक मुलगी ना तुझी? लोक काय म्हणतील? असं नको करू बाई. ” दोघीजणी म्हणाल्या. “ आधीच बिचारी घटस्फोट झाल्याने दुःखी आहे. ” वीणा काहीच बोलली नाही.

“ तिला तुम्ही दिलेत का पैसे? फार नाही पण पन्नासच हजार हवे होते. ” दोघीनी चमकून एकमेकींकडे बघितलं. माई चाचरत म्हणाली, “ हो. मागत होती खरी आमच्याकडे पण आम्ही कुठून देणार ग? ”

“ हो ना? मग आता तिच्या भानगडीत पडू नका. लाडक्या भाचीचं प्रेम उतू जात असेल तर घ्या ठेवून स्वतःच्या घरी. ” वीणा आत निघून गेली.

बहिणी निघून गेल्या. वीणा शांत होती. पुढे काय होते ते बघायचं होत तिला. वीणाला वाईट वाटलं की आपला नवरा या कशातच आपली साथ देत नाहीये. पण तिने आता त्याच्याकडून अपेक्षा करणंच सोडून दिलं. तो महिना तसाच गेला. एक दिवस मंजिरी वादळासारखी घरात आली आणि सगळं सामान पॅक करायला लागली.

“ मंजिरी, कुठे जाते आहेस? काय करणार आहेस तू? ”

“ तुम्हाला मी नकोय ना तुमच्या घरात? मग मी कुठेही जाईन. ”

“ मंजिरी, माझ्या प्रश्नाचं हे उत्तर नाही. तुला तुझ्या जबाबदाऱ्या समजायला हव्यात. मी आई आहे तुझी. वैरीण नाहीये. तू नीट मार्गी लागावंस हीच माफक अपेक्षा आहे माझी “ वीणाच्या डोळ्यात पाणी आलं. ” हे बघ. तुझं नवऱ्याशी पटलं नाही, ठीक आहे. पण आम्ही तुला जन्मभर पुरणार नाही. तू नीट मार्गी लागावीस, पुन्हा संसार थाटून पायावर उभं रहावंस ही अपेक्षा चुकीची नाहीये. नीट विचार कर आणि मग पाऊल उचल. ”

” मला माझं हित कळतं. तुम्हाला बट्टा लागेल असं काही करणार नाही मी. गोव्याला जातेय. माझा गणेश म्हणून मित्र आहे त्याच्याबरोबर मी रहाणार आहे. बघते काय जमतं ते. काळजी नको करू. बघेन मी काय करायचं ते. ” मंजिरीने स्पष्ट सांगून टाकलं.

वीणा आत गेली. पाच लाख रुपयांचा चेक लिहून तिच्या हातात ठेवला. “ मंजिरी, नीट विचार केला आहेस ना सगळा? ”

मंजिरी चेक घेऊन न बोलता घराबाहेर पडली. वीणाला चैन पडेना. ती तडक रूपा- सुधीरकडे गेली. सुधीरला हे सगळं तिनं सांगितलं. सुधीर विचारात पडला. त्या दोघांनाही वाटलं, आता पुढे काय होणार? आपणच वीणाला चुकीचा सल्ला तर दिला नाही ना? उगाच पडलो का यांच्या भानगडीत?

वीणाने जणू त्यांच्या मनातले विचार ओळखले. “ हे बघ रूपा सुधीर, तुम्ही मला योग्यच सल्ला दिलात. तिशी ओलांडलेली मुलगी लहान नाहीये. नाही जमलं तर ती परत येईल हे नक्की. मी माझ्या मुलीला चांगलीच ओळखते. यातून तिचं भलं झालं तर देवच पावला. मी तुम्हाला कधीही दोष देणार नाही. आता वाट बघण्याशिवाय मी काहीही करू शकत नाही. ” 

या गोष्टीला पाच वर्षे झाली. या काळात मंजिरीचा आईवडिलांना कधीही फोन आला नाही, की ती कुठे आहे काय करते हेही कोणाला समजलं नाही. वीणा शांत होती. रूपा सुधीर तिला नेहमी भेटत. वीणा म्हणाली, “आपण जन्म देतो पण कर्म नाही देऊ शकत ग मुलांना. माझेच योग चांगले नाहीत तिच्याशी. ”

एक दिवस अचानक बेल वाजली. वीणाने हळूहळू जाऊन दार उघडलं. हल्ली फार गुडघे दुखत तिचे. दारात मंजिरी उभी होती. मागे बघितलं तर तिच्या मागे एक पुरुष उभा होता.

वीणाने त्यांना आत या म्हटलं. मंजिरीच्या अंगावर छान ड्रेस होता. हातात भारी पर्स, कानात चमकणारे हिरे दिसत होते.

मंजिरी म्हणाली, “ आई, हा गणेश. मी याच्याच बरोबर गोव्याला गेले. हा साऊथ इंडियन आहे. आम्ही तिकडे एक अगदी लहान स्नॅक्स सेन्टर चालवायला घेतले. आई, तू दिलेले पाच लाख मला फार उपयोगी पडले. ”

गणेश म्हणाला “ आई, ते सेन्टर छान चालायला लागले. मी स्वतः चांगला कुक आहे पण पैसे नाहीत म्हणून हॉटेलात नोकरी करत होतो. मंजिरी मला भेटली आणि आम्ही गोव्याला जायचं ठरवलं.

आमचे हे स्नॅक्स सेन्टर फार छान चालायला लागलं. मग आम्ही नवीन साऊथ इंडियन हॉटेल चालवायला घेतलं. आहे छोटंसं पण तेही चांगलं चालतंय. गोवा खूप महाग आहे आणि सीझन नसला की कोणी टुरिस्ट येत नाहीत. पण आमचं हे हॉटेल स्वस्तआहे. ठराविकच पदार्थ आम्ही करतो. मस्त चाललंय आमचं. आमच्याकडे मात्र कायम गर्दी असते. ” 

मंजिरी आईजवळ बसली.

“ आई, मला माफ करशील ना? मी खूप वाईट वागले ग तुमच्याशी. सगळ्या जगाचा राग मी तुझ्यावर काढला. खूप मनस्ताप दिला तुम्हाला. मुळात मी वाईट नाहीये ग. अपयश माणसाला फार कडवट बनवते ग. पण मी खूप चुकले आई. आता समजतं मला, किती वाईट वाटलं असेल तुला, मी अशी त्रास देत होते तुला तेव्हा. बाबा आई, मी चुकले. मला क्षमा कराल ना? ”

वीणाने मंजिरीला जवळ घेतलं. ” मंजिरी, तू गेल्यापासून एक क्षण मी नीट झोपले नाहीये की अन्न गोड लागलं नाही मला. पोटचा गोळा आहेस तू. पण आता तुम्हाला असं छान सेटल झालेलं बघून किती आनंद झाला म्हणून सांगू? गणेश, तुमचेही खूप आभार मानते मी. माझ्या मुलीला आधार दिलात तिला नीट मार्गावर आणलेत. ” 

गणेश म्हणाला, “ मंजिरी चांगलीच आहे हो. आमची कॉलेजपासून मैत्री आहे. मला तिने विश्वासाने तुम्ही दिलेले पाच लाख रुपये दिले. खूप कष्ट केले आम्ही या पाच वर्षात. बँकेचे कर्ज काढले, ते फेडतो आहोत. पण आमचं हॉटेल खूप छान चाललं आहे. आम्ही तुम्हा दोघांना गोव्याला न्यायला आलो आहोत. ” 

वीणाच्या डोळ्यात पाणी आलं. पूर्ण बदललेली आत्मविश्वासाने उभी असलेली ही नवीनच मंजिरी तिच्या समोर उभी होती.

वीणा हसत म्हणाली “ येणार तर. पण मंजिरी गणेश, असेच रहाणार कायम का लग्नही करणार? आम्हाला आवडेल हा जावई. ”

मंजिरी लाजली. “ आई, लग्न करणार आहोत आम्ही, म्हणूनच तू आणि बाबा उद्या गोव्याला या. गणेशला आईवडील नाहीत. म्हणून तुम्ही आमचं लग्न लावून द्या. “ गणेश वीणाच्या आणि बाबांच्या पाया पडला.

वीणाने दोघांना जवळ घेतलं.

“ हा दिवस आयुष्यात येईल असं वाटलं नव्हतं रे बाबांनो. त्या मंगेशाचीच कृपा म्हणायची. मंजिरी, किती आनंद झाला म्हणून सांगू ग? आपलं वाट चुकलेलं वासरू नीट मार्गाला लागलेलं बघून कोणत्या आईला धन्य वाटणार नाही बाळा? माझं चुकलं असलं तर मला माफ कर मंजिरी. पण तुझं भलं व्हावं हीच इच्छा होती बरं आमची. या आता घरात. तुम्ही म्हणता तसंच होईल. छान लग्न करू तुमचं मंगेशीच्या देवळात. ” 

…… डोळे पुसत वीणा देवाला साखर ठेवायला आत वळली.

– समाप्त –

© डॉ. ज्योती गोडबोले

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ वाट चुकलेलं वासरू… — भाग – १ ☆ डॉ. ज्योती गोडबोले ☆

डॉ. ज्योती गोडबोले 

? जीवनरंग ❤️

☆ वाट चुकलेलं वासरू… — भाग – १ ☆ डॉ. ज्योती गोडबोले 

काल सगळ्या मैत्रिणींनी बागेत जमायचं ठरवलं होतं. त्यांच्या ग्रुपमधली जया आता चार महिने सुनेकडे चालली होतीजपानला. मग त्यांची भेट होणार नाही म्हणून सगळ्या बागेत जमणार होत्या. मग गप्पागोष्टी झाल्यावर समोरच्या हॉटेलमध्ये खाऊन मग घरी जायचं अस ठरवलं होतं त्यांनी.

या सगळ्या मैत्रिणी जवळ रहाणाऱ्या, तरुणपणीच शेजारी शेजारी फ्लॅट असल्याने आता पक्क्या मैत्रिणी झालेल्या. सगळ्यांची मुलं मोठी झाली, कोणी इथेच छान सेटल झाली. काहींची परदेशी गेली. मग आईवडिलांच्या परदेश वाऱ्या सुरू झाल्या.

आज अजून वीणा कशी आली नाही म्हणून तिची वाट बघत सगळ्या थांबल्या होत्या. इतक्यात धापा टाकत वीणा आलीच.

“ सॉरी ग बायानो. मला घरातून निघायलाच उशीर झाला आणि मग रिक्षाच मिळेना. ” घाम पुसत वीणा म्हणाली. वीणा रूपाच्या शेजारी बसली. रूपा आणि वीणाची फार घट्ट मैत्री होती. दोघीनीही एकाच बँकेत नोकरी केली. दोघींचे नवरेही बँकेतच होते. रुपाला एकच मुलगा. छान शिकून तो परदेशी स्थायिक झाला. वीणाला एकच मुलगी… मंजिरी.

या सगळ्याजणी वीणा आल्यावर समोरच्या हॉटेलमध्ये गेल्या. जयाने आज सगळ्याना पार्टी दिली.

“ आता मी चार महिने जपानला असणार. संपर्कात रहा ग. टेक्स्ट फोन करत रहा. नाहीतर जाल विसरून मला. ” हसत हसत जया म्हणाली. भरपूर खाऊन झाल्यावर सगळ्या निघाल्या.

वीणा म्हणाली “ रूपा, घाई आहे का ग तुला घरी जायची? नसेल तर चल ना जरा बागेतच बसूया. ” सगळ्या गेल्यावर वीणा आणि रूपा बागेतल्या बाकावर बसल्या. वीणा खिन्न होऊन समोर बघत होती. मनात दुसरेच विचार चालले होते तिच्या. रूपा म्हणाली, “आता सांगून टाक बघू काय झालंय ते. ”

वीणा खिन्नपणे म्हणाली, “ काय सांगू ग रोजचीच रडकथा. आपलेच दात आपलेच ओठ. आजही माझं आणि मंजिरीचं वाजलं. अग कशी वागते ग ही मुलगी.. माझी एकुलती एक सख्खी मुलगी ना ही? कोणाला सांगितलं तर विश्वास तरी बसेल का? नुसता छळ झालाय हिच्यामुळे आमचा. चांगलं छान स्थळ बघून थाटामाटात लग्न करून दिलं. देवमाणसं आहेत बरं सासरची माणसं. जेमतेम चार वर्षे नांदली आणि पटत नाही म्हणून कायमची आली माघारी. नोकरी तर कधी केलीच नाही आणि करायचीही नाहीये. कठीण आहे ग बाई सगळं. काल बाहेरून आली आणि म्हणाली, ’आई माझ्या अकाउंटला वीस हजार रुपये ट्रान्सफर कर. मला हवे आहेत लगेच. ’ अग, काय हा त्रास मला? हे तर काहीही बोलत नाहीत. मला फार त्रास होतो ग. माझी सगळी मनःशांती बिघडून गेलीय हिच्या असल्या वागण्याने. ” वीणाच्या डोळ्यात पाणी आलं.

रूपा हे सगळं ऐकत होती. “ काय ग वीणा, हिने घटस्फोट घेतला तेव्हा नवऱ्याने अँलिमनी नाही का दिला? ”

“ नाही ना. चालली आहेत कोर्टात भांडणं. ती म्हणते मी नोकरी केली तर मला तो देणार नाही पैसे म्हणून ही काहीही करत नाही. मला नको जीव झालाय बघ. आलीय परत ते ठीक आहे, माझीच मुलगी आहे ग ती. तिला सपोर्ट करणं आमचं कामच आहे, पण तिला त्याची अजिबात जाणीव नाही. आज तीन वर्षे झाली, हे सहन करतोय आम्ही. किती पैसे पुरवू मी हिला? वर म्हणते, ’नाहीतरी हे सगळं तुम्ही मलाच देणार ना? मग आत्ताच दिलंत तर काय बिघडलं? ‘ बिनदिक्कत म्हणते, ‘ मला पैसे हवेत. ’ आज दहा.. उद्या पंधरा करत आता मीच खंक होईन बघ रूपा. परवा म्हणाली, ‘ हा फ्लॅट माझ्या नावावर करून द्या. मी काय तुम्हाला टाकणार नाहीये, मलाच करायचं आहे ना तुमचं शेवटी? ’ ”

रुपाला हे ऐकून फार वाईट वाटलं. आपली लाडकी मैत्रीण विनाकारण अशी कात्रीत सापडलेली पाहून तिला फार वाईट वाटलं. न बोलता वीणा घरी निघून गेली. रूपाने घरी येऊन खूप विचार केला. आपल्याच मुली अशा वागतात? हक्काने आईवडिलांच्या घरी परत यायचं आणि त्यांना ओरबाडून घ्यायचं? कोणत्या हक्काने? वर ही अरेरावी?

रूपा हे तिच्या नवऱ्याशीही बोलली. त्याला फार वाईट वाटलं. तो म्हणाला, “ तुझ्या मैत्रिणीनेच या बाबतीत फर्म स्टॅण्ड घेतला पाहिजे. जितके हे लोक सहन करत रहातील ना रूपा, तितकी ही मुलगी अरेरावी करत राहील. एकदाच तिला सुनवायला नको का? आपण सगळे गेल्यावर आपल्या संपत्तीवर हक्क सांगणं वेगळं आणि असं आईवडिलांना ब्लॅकमेल करणं तर फार वाईट. हे काय ग मंजिरीचं बोलणं, की नंतर तरी मलाच देणार तर आत्ताच द्या. अत्यंत चुकीचं आहे हे. तुझी वीणा हे का सहन करत राहिली आहे? ” रूपा गप्प बसली. नक्की काय आहे हे तिला तरी कुठं ठाऊक होतं?

त्यानंतर बरेच दिवस झाले. रूपाची वीणाशी गाठभेटच झाली नाही. नंतर अचानक वीणा रुपाला भाजी मार्केट मध्ये भेटली.

रूपाने विचारलं “ कशी आहेस वीणा? काय म्हणते मंजिरी? ” 

वीणा म्हणाली, “ जैसे थे. काहीही बदल नाही. मला आता कंटाळा आलाय ग या सगळ्या न बदलणाऱ्या परिस्थितीचा. काय करावं काही सुचत नाहीये. परवा तर हद्द झाली. म्हणाली, ‘ आई, तुम्ही दोघे वृद्धाश्रमात का जात नाही? मी इथे एकटी राहीन. तुमचे स्वातंत्र्य तुम्हाला आणि माझं मला. कशाला आपण रोज वाद विवाद करत रहायचं? ‘ रूपा, आता हेच शिल्लक राहिलं होतं बघ ऐकायचं. असुनी खास मालक घरचा… ”

वीणाला रूपाने घरी बोलावलं. “ वीणा, आज संध्याकाळी माझ्या घरी ये. आपण बोलूया आणि यावर आता आपण उपाय शोधूच या ग. तुझा नवरा काहीही बोलत नाही. पण तू असं उगीच सहन नको करत बसू. मी माझ्या नवऱ्याशी.. सुधीरशी बोललेय. निघेल निघेल मार्ग. ”

 त्या दिवशी संध्याकाळी वीणा रुपाकडे गेली. सुधीर आणि रूपा हॉलमध्ये बसले होते. चहा खाणे झाल्यावर सुधीर म्हणाला, “ वीणा, हे बघ. मला रूपाने सगळं सांगितलं आहे. तुम्ही आत्तापर्यंत मंजिरीला खूप टॉलरेट केलंत. तिला असं वाटतंय की तुम्ही तिला घाबरता. ती म्हणेल ते ऐकता. असं सहन करू नका वीणा. तुम्हाला असं वाटतंय का, तिने म्हातारपणी आपल्याला विचारलं नाही तर आपलं कसं होईल? असं काही नसतं. मुलं असूनही ती इथे नसलेल्या लोकांना तरी काय उपयोग असतो त्यांचा? तुम्ही आता कठोर पावलं उचलायची वेळ आलीय. माझं ऐकणार असलात तर सांगतो. “ सुधीर बोलायचा थांबला.

वीणा म्हणाली “ सांगा तुम्ही. मी ऐकेन तुमचं. त्यासाठीच तर आलेय ना? ”

सुधीर म्हणाला, “ हे बघ वीणा, मान्य आहे मंजिरी तुमची एकुलती एक मुलगी आहे. दुर्दैवाने ती सासरी नाही राहू शकली. कारणे काही का असेनात पण तुम्हाला तिच्या वागण्याने त्रासच होतोय आणि तिला त्याची जाणीव नाहीये म्हणा किंवा ती मुद्दाम करते म्हणा. तुम्ही तिला याची जाणीव करून द्यायची वेळ आलीय आता. तुम्ही या आठवड्यात तिघेजण एकत्र बसा. तू स्वतः स्पष्ट शब्दात तिला सांग. ‘ मी यापुढे तुझे हे वागणे बोलणे सहन करणार नाही. अति झालं आता. एक तर तुला नोकरी करावी लागेल आणि आमच्याशी नीट वागावे लागेल. नाहीतर काय करायचं ते तू ठरव. मला हा खर्चही परवडेनासा झालाय तुझा. मी फक्त तुला दोनच महिने पैसे देईन. तेवढ्यात तू नोकरी शोध. आणि मला असे हुकूम केलेले चालणारच नाहीत. माझ्या खात्यात पैसे भर आणि काय काय. तुझ्या केसचा माझ्याशी काहीही संबंध नाही. आमचा विचार कधीही करावासा का ग वाटत नाही मंजिरी तुला? किती शोषण करशील आमचं? नीट विचार कर. एवढी शिकलेली मुलगी तू, गेली तीन वर्षे खुशाल आईवडिलांच्या जीवावर मजा मारतेस? वडील काहीही बोलत नाहीत पण मला त्रास होतोय या तुझ्या उन्मत्त वागण्याचा. अशाच वागतात का तुझ्या मैत्रिणी आईवडिलांशी? लवकरात लवकर नोकरी बघायची आणि शक्यतो लवकर वेगळा फ्लॅट भाड्याने बघ. ’ वीणा, हे असं आणि एवढं बोलशील का? “ सुधीर म्हणाला.

“ आणि हे बघ वीणा, रोग जालीम असेल तर उपायही जालीमच करावा लागतो. किती दिवस सहन कराल हे मूर्खांसारखे तिचे वागणे ग? बघ तरी काय करते ती ते. वीणा, तुझ्या म्हातारपणाची काळजी करू नकोस. असंही, ही काय ग तुम्हाला आधार देणार? पुढचं पुढं बघता येईल. ” 

वीणा सुधीरकडून नवं बळ घेऊन घरी आली. घरी मंजिरीने पिझा मागवला होता.

”आई त्या डिलिव्हरीचे आठशे रुपये देऊन टाक ग ”.. बसल्याबसल्या मंजिरीने फर्मावले. वीणा सरळ आत निघून गेली. वाट बघून फणफण करत मंजिरीने पैसे दिले.

– क्रमशः भाग पहिला 

© डॉ. ज्योती गोडबोले

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ “कशाला उगीच!” ☆ श्री मंगेश मधुकर ☆

श्री मंगेश मधुकर

🔆 जीवनरंग 🔆

☆ “कशाला उगीच!!” ☆ श्री मंगेश मधुकर

ऑफिसच्या कामासाठी बाहेरगावी निघालेलो. कन्फर्म तिकीट असल्यानं निवांत होतो. बारा तासाचा रेल्वेप्रवास सहप्रवासी चांगले मिळाले तर बहार येईल असं मनात आलं. बॅग ठेवून बसलो. काही वेळातच एकजण समोर बसला. नजरा नजर झाल्यावर दोघांचे चेहरे पडले. तो सुऱ्या होता. एकेकाळचा घट्ट मित्र पण आता…. ज्याचं तोंड सुद्धा बघायची इच्छा नाही असा माणूस. कडाक्याचं भांडण झाल्यापासून आमच्यात बोलचाल बंद होती. तीन वर्षांनी समोरासमोर आलेलो. सुऱ्याला पाहून डोक्यात तिडिक गेली. मागचं सगळं आठवलं पण शांत बसलो. गाडी फुल असल्यानं सुऱ्याचाही नाईलाज झाला. समोरासमोर असलो तरी मुद्दामच बघणं टाळत होतो. खूप विचित्र अन अवघडलेली अशी अवस्था. सहन होईना अन सांगता येईना असा प्रकार. मोबाइलमध्ये तोंड खुपसलं पण मन बेचैन होतं. एकदोनदा लक्ष गेलं नेमकं तेव्हा सुऱ्या माझ्याकडं पाहत होता. असं सारखं व्हायला लागलं. पुन्हा एकदा नजरानजर झाल्यावर दोघंही हसू रोखू शकलो नाही.

 “ए भाxxx, अजून कितीवेळ माज दाखवणारेस”न राहवून सुऱ्यानं तोंड उघडलं.

“साxx, माज मी दाखवतोय की तू? ”

“दोघंही”म्हणत सुऱ्यानं टाळीसाठी हात पुढे केल्यावर मी प्रतिसाद दिला.

हुssश!!

मनावरचा ताण एकदम हलका झाला. काही क्षण पुन्हा शांतता. भरून आलं म्हणून दोघांनी मान फिरवली. एकदम माझा हात हातात घेत सुऱ्या म्हणाला. “किती दिवसांनी भेटतोयेस. कसायेस”

“मी मस्त. तुझं सांग”

“ठीक. रुटीन लाईफ. यार, त्यादिवशी खरंच वाटलं नाही की प्रकरण एवढं मोठं होईल. ”सुऱ्या.

“तू असं बोलशील असं वाटलं नव्हतं. मनाला खूप लागलं आणि प्रचंड राग आला म्हणूनच…. ”

“माफ कर मित्रा!! चूक झाली. ”

“भेटत नव्हतो पण तू डोक्यातून जात नव्हता. रोज आठवण यायची. ” 

“मला पण”सुऱ्या 

“मग फोन करायचा ना”

“कुठल्या तोंडानं करणार. वाट्टेल ते बोललो म्हणून तर आपल्यात फाटलं ना. ”सुऱ्या.

“जे झालं ते झालं. परत तो विषय नको. ”

“नाही रे. बोलू दे. मनात खूप साचलयं. अनपेक्षितपणे आज चान्स मिळालाय. थॅंक्स टु रेल्वे”

“ऐकणार नाहीस. अजून तसाच आहेस. स्वतःला पाहीजे तेच करणार”

“हम नही सुधरेंगे. ”

“हम भी…… लहानपणापासून तुझ्याच संगतीत आहे. ”

“तरीसुद्धा माझ्या नादी लागतोस. माहितीये ना. डोकं फिरलं की स्वतःवर कंट्रोल राहत नाही. ”

“चांगलचं माहितीये. हजारवेळा भांडलो. अगदी अंगावर धावून गेलो. एकमेकांच्या गचांडया पकडल्या आणि शिव्या शिवाय तर बोलणं नाही.

यालाच तर जिवलग मैत्री म्हणतात. ”

“आपल्यात वाद नवीन नाहीत पण यावेळी तू बोलणचं बंद केलं. ”

“कारणही तसंच होतं ना. ”

“मी चुकलोच. पुढाकार घेऊन समेट करण्याऐवजी एकदम संबंध तोडून तीस वर्षाची मैत्री संपवलीस. ”

“सुऱ्या, याचा त्रास मलाही झाला पण नाईलाज होता. आपल्यात घडू नये ते घडलं. त्यादिवशी मैत्रीच्या नात्यातली मर्यादा ओलांडली गेली. ”

“तू इतकं चिडशील असं वाटलंच नाही. ”

“त्यालाही कारण आहे. जसा तुला अभिमान आहे तसाच मलाही आहे. याआधीही चार-पाच वेळेला चेष्टेनं बोललास तेव्हा दुर्लक्ष केलं पण त्यावरून पुन्हा पुन्हा होणारा उल्लेख खटकला. त्यादिवशी तर तू डायरेक्ट जिव्हारी लागेल असं बोललास. आतापर्यंत तुझ्याकडून असं ऐकलं नव्हतं. ”

“डोकं ठिकाणावर नव्हतं. टेन्शनमध्ये होतो. ”

“उगीच काहीही कारणं देऊ नकोस. सोशल मीडियावर काय वाचतोस. कोणाला फॉलो करतोस सगळं माहितीय. मनात प्रचंड राग, चीड होती आपल्यातल्या भांडणाच्या निमित्तानं ती मळमळ बाहेर पडली. कट्टर अभीमानी आहेस. ”

“ते तर अजूनही आहे. ”

“काहीच हरकत नाही. सगळेच आहेत. एवढंच सांगायचयं की विचार, स्वभाव, वागणं वेगवेगळं असूनही आपली मैत्री टिकली. एकमेकांना चांगले ओळखतो तरीही तू एकदम माझ्या जातीवर घसरलास. नको त्या शब्दात उद्धार केलास. गरज नसताना टोमणे मारलेस. ”

“जाऊ दे ना. माझी जीभ घसरली. ”सुऱ्या 

“ते काहीही असो. आपल्यात ‘जात’ कुठून आणि का आली. ”

“भावनेच्या भरात बोललो. माफ कर ”

“प्रश्न माफीचा नाहीये. तू असं बोलशील हे स्वप्नातही वाटलं नव्हतं. त्याचाच धक्का बसला. आपण मैत्री ‘जात’ बघून केली नाही. “

“माहितीये”

“एक सांगतो, ‘जात’ प्रत्येकाच्या मनात असतेच. कोणी दाखवतं तर कुणी लपवतं. प्रत्येकाला आपल्या जातीचा अभिमान असतो. त्यात वावगं काही नाही मात्र त्यासाठी इतरांना कमी लेखू नये. मैत्रीसारखी नाती निरपेक्ष असतात. तिथं तर हे नकोच. ” 

“सगळं मान्ययं. हे आधी का बोलला नाहीस. त्याचवेळेस चार शिव्या देऊन कानफाडलं असतंस तरी चाललं असतं. तुला तेवढा अधिकार नक्कीच आहे ”

“त्यावेळी तू बिथरलेला अन मी दुखावलेला. काही बोललो असतो तर वाद वाढला असता म्हणून गप्प बसलो. तुझ्या लक्षात येईल असं वाटलं पण…. ”

“संतापाच्या भरात काय बोलून गेलो हे लक्षात आल्यावर फार वाईट वाटलं. स्वतःचा खूप राग आला. माफी मागण्यासाठी फोन केला. मेसेज केले पण तू रिपलाय दिला नाहीस. ”

“तरी तुला सांगत होतो. सोशल मीडियाच्या नादी लागू नकोस. भावना भडकवणाऱ्यांपासून सावध रहा. काहीच साध्य होणार नाही फक्त नाती तुटतील. संधीसाधू लोक वापरून फेकून देतील. ” 

“अगदी खरंय. अनुभव आल्यावर डोळे उघडले. मनापासून सॉरी यार!! ”

“यापुढं काळजी घे. जातीवरुन कोणाला कधीही काहीच बोलू नकोस. फार भावनिक आणि संवेदनशील विषय आहे. असो… आपल्याला मैत्री अजून पन्नास वर्ष टिकवायचीय. “

“शंभर टक्के!! , यापुढं कानाला खडा. आता बट्टी!! ”लहानपणी करायचा तसं दोन बोटं पुढं करत सुऱ्या म्हणाला तेव्हा मोठ्यानं हसायला आलं. सुऱ्याच्या बोटाला बोट टेकवत म्हणालो…..

…. “बट्टी!! , मैत्रीत जात लांब ठेवू. गंमतीत सुद्धा उल्लेख नको. आपलं इतकं छान नातं असताना कशाला उगीच!!

© श्री मंगेश मधुकर

मो. 98228 50034

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares