श्री प्रदीप केळुस्कर
जीवनरंग
☆ बेचैनी… – भाग-२ ☆ श्री प्रदीप केळूसकर ☆
(‘खरे आहे.. जगात अशी विषमता आहे खरी.. पण त्याला आपण काय करणार?
‘काय तरी करावे असे वाटते. ’ अजयने फोन ठेवला.) – इथून पुढे —
एक दिवस तिच्या जाऊने लक्ष्मीने तिच्या मुलाला अनिकेतला पार्कमध्ये न्यायचे ठरविले. सासू आणि मालती पण सोबत होत्याच.. अनिकेत पार्कमध्ये थोडा खेळला आणि शेवपुरी मागायला लागला.. मालती त्याला घेऊन कोपऱ्यातल्या भैय्याकडे गेली.. तिने चार शेवपुरी बांधून घेतली, इतक्यात तिचे लक्ष बाजूला उभ्या असलेल्या भिकाऱ्यांच्या मुलाकडे गेलं.. ती दोन मूल.. अंगात धड कपडे नाहीत.. केसाला कित्येक दिवस तेल नाही.. तिच्याकडे काही तरी मागत होती.. मालतीला गलबलून आलं.. काय ही गरिबी.. तिने झटकन हातातील शेवपुरीची पूडी त्या मुलांना दिली. तिने भैय्याला पुन्हा ऑर्डर दिली. ती घेऊन जाताना ती पहात होती… ती दोन मुले त्या शेवपुरीवर तुटून पडली होती.. तिच्या डोळ्यात समाधान होत.
तिची सासू आणि जाऊ सर्व पहात होत्या.. तिने त्या भिकारी मुलांना ती पूडी दिल्याचे त्याना आवडले नव्हते.
‘अशाने भिकारी कमी होत नाहीत.. वाढतात.. काम न करता खायला मिळाले ना.. मग काम कशाला करायला हवे?
‘ती करतील हो.. करतील… गरिबी हा त्त्यांचा दोष नाही.. समाजाचा आहे.. समाजात श्रीमंत गरीब अशी दरी पडली आहे.. आहे त्याना त्याचे काय करावे असा प्रश्न पडला आहे.. आणि नाही त्याना.. तिला अनुजा आठवली.. धक्के खात रोज नालासोपारा.. मग st.. मग चालत.. पुन्हा दुसऱ्या दिवशी उलट प्रवास..
मालतीला रात्रभर झोप आली नाही.. पार्कमधील ती दोन पोरे.. त्त्यांचे आसूसलेले डोळे, तिचा पिच्छा पुरवत होते. आज या मुलांना आपण शेवपुरी दिली पण उदया कोण देणार? बहुतेक लोक आपल्या सासुसारखे त्याना हिंदीसफिडीस करणार.. मग काय करतील ती मुले..
दुसऱ्या दिवशी अजयचा फोन आला तेंव्हा तिने कालचा पार्कमधील प्रसंग सांगितला.. पण त्या आधीच त्याच्या आईने तो सांगितला होता. अजय म्हणाला –‘अशी दरी आहेच, पण आपण काय करू शकतो.. अशा किती मुलांना आपण जेऊखाऊ घालू शकतो..
तिने फोन ठेवला.
त्यान्च्या घरात सरस्वती बरीच वर्षे कामाला येत होती.. मालती लग्न होऊन आली, त्या दिवसापासून सरस्वती होती.. घरातील भांडी.. लादी.. कपडे.. तीच करायची. अचानक ती यायची बंद झाली. तिचा नंबर लक्ष्मीकडे होता.. ती रोज फोन करायची पण कुणीच उचलायचा नाही.. घरातली कामे करायची सवय नसल्याने पंचाईत झाली.. पण मालतीने तिची कामे केली. पण तिच्याही मनात येत होते.. सरस्वती यायची बंद झालीच पण फोन पण बंद? तिने लक्ष्मीला तिच्या घरचा पत्ता विचारला आणि चौकशी करत करत ती सरस्वतीच्या झोपडीत येऊन पोचली… ते दारिद्र्य.. ती उघडी गटारे.. नागडी पोर.. डुकरे घुशी, उंदीर यांचा सुळसुळाट… दारू, जुगार.. नशिले पदार्थ.. भडक कपडे घातलेल्या मुली.. सगळीकडे नुसती घाण.. मुंबईची ही दुसरी बाजू मालतीने फक्त सिनेमांत पाहिली होती. तशाच एका झोपडीत सरस्वती झोपली होती.. नागीण नावाच्या आजाराने तिला घेरले होते. पाठीपासून छातीपर्यत नागीण पसरली होती.. मालतीने टॅक्सी मागवली आणि सरस्वतीला केइएम हॉस्पिटलमध्ये पोचवले..
सरस्वतीच्या घरातील आणि आजूबाजूची गरिबी पाहून ती अस्वस्थ झाली.. कशी राहतात ही माणसे? यांना कसे बाहेर काढता येईल या घाणीतून? काय करावे?
अनेक प्रश्न तिला पडत होते.
हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केलेल्या सरस्वतीची ती चौकशी करत होती.. उपचारानी सरस्वती बरी होत होती.
.. तीन महिन्याचे काम संपताच अजय परत आला आणि मालती खूष झाली.. तिच्या विचाराचा आदर करणारा घरात तिच्या हक्काचा माणूस अजय होता.
ती आता अजयशी या विषयावर बोलू लागली. अजयला पण तीच कौतुक होत.. लहानपणापासून श्रीमंतीत राहून सुद्धा तिला गरिबाबद्दल दया वाटतं होती.. जगातील दारिद्र कमी व्हायला हवे यासाठी तिला प्रयत्न करायचे होते.. पण सुरवात कशी करावी हे कळत नव्हते.
अजयने तिला एक म्यॅगेझीन आणून दिले.. त्यात पुण्यातील एक डॉक्टर भिकाऱ्यांच्या मुलासाठी शिक्षण हा उपक्रम राबवत होता.. त्यासाठी समाजातील बरीच मंडळी आर्थिक आणि शारीरिक मदत करत होती. ती अजयला घेऊन पुण्याला गेली आणि या डॉक्टरना भेटली.. त्त्यांचे काम पाहिले.. ती प्रभावित झाले. ती डॉक्टरना म्हणाली..
‘तुमच्यासारखें मलाही काम करायचे आहे.. सुरवात कुठून करू?
“तुम्ही ओळखता अशा एखाद्या दरिद्री कुटुंबापासून सुरवात करा.. त्या कुटुंबाला आधार द्या.. मुलांना सुशिक्षित करा..
मालती विचार करत राहिली.. कुठून सुरवात करू? अचानक तिच्या डोळयांसमोर सरस्वतीची झोपडी आली.. त्या झोपडीत सरस्वतीची नवऱ्याने टाकलेली मुली आणि तिची दोन मुले होती.. सरस्वती आता बरी होऊन घरी आली होती. ती सरस्वतीच्या घरी गेली.. सरस्वतीच्या मुलीची दोन मुले अजून शाळेत जात नव्हती.. आजूबाजूला अशीच आणखी बारा मुले होती. तिने अजयला सांगून एक गाडी ठरवली आणि या चवदा मुलांना दादरच्या शाळेत प्रवेश घातले. सरस्वती सून घरात बसुन होती तशीच आजूबाजूला सहा मुली घरात रिकाम्या होत्या. कुर्ल्याच्या गारमेंट कंपनीत या मुलींना नोकरी मिळवून दिली..
ही बातमी कळताच अजून स्त्रिया तिला भेटायला आल्या.. त्या सर्वाना तिने हॉस्पिटल, मॉल, कुरिअर सेवा, हॉटेल्स अशा ठिकाणी नोकऱ्या मिळवून दिल्या. त्या भागात आता तिच्या शब्दाला किमत आली.
अजय कौतुकाने सर्व पहात होता.. मालती खूष होती.. पुण्याचे डॉक्टरपण फोन करून चौकशी करत होते.
मालतीचा व्याप वाढला.. मग संध्या, मीना तिच्या मदतीला आल्या.. काही कार्पोरेट्स कडून मदत मिळू लागली. पेपर मधून मुलाखती येऊ लागल्या. मुलाखतीत ती म्हणाली “मी बेचैन स्त्री आहे.. मी अस्वस्थ असते.. मला पैसे दागिने यात समाधान नव्हते.. समाजातील बरीच लोक दारिद्यात आहेत, त्या सर्वाना आपण बाहेर काढू शकत नाही.. पण निदान काहीजणांना. पुण्यातील एक डॉक्टर भिकारी नष्ट करण्याचा प्रयत्न करत आहेत.. प्रत्येकाने स्वाभिमानाने जगायला हवे. भीक मागून नव्हे..
खुप दिवसांनी अजय आणि मालती गप्पा मारत चहा घेत होती.. अजय गमतीने म्हणाला “मालू.. झोपड्यातून शाळेत न जाणाऱ्या मुलांना तू शाळेत पाठविलेस..
पण आता आपण आपल्या मुलाचा विचार करूया का..
त्याच्या गमतीने मालती लाजली आणि त्याच्या कुशीत शिरत म्हणाली “, , होय.. आता विचार करूयाच..
– समाप्त –
© श्री प्रदीप केळुसकर
मोबा. ९४२२३८१२९९ / ९३०७५२११५२
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर ≈











