मराठी साहित्य – पुस्तकांवर बोलू काही ☆ रंग हळव्या मनाचे- लेखक – श्री दीपक तांबोळी ☆ परिचय – श्री मकरंद पिंपुटकर ☆

श्री मकरंद पिंपुटकर

? पुस्तकावर बोलू काही ?

☆ रंग हळव्या मनाचे- लेखक – श्री दीपक तांबोळी ☆ परिचय – श्री मकरंद पिंपुटकर ☆

पुस्तक : रंग हळव्या मनाचे

लेखक : श्री दीपक तांबोळी

प्रकाशक : अथर्व पब्लिकेशन्स 

पृष्ठ: १३६ 

मूल्य: ₹ १६० 

दीपक तांबोळी या सिद्धहस्त लेखकाचा आणखी एक कथासंग्रह हाती आला – “रंग हळव्या मनाचे”. आणि त्यांच्या याच पुस्तकातील “बदल” या कथेत म्हटल्याप्रमाणे, एकापाठोपाठ एक – सगळ्याच कथा अधाश्यासारख्या वाचून काढल्या. काही कथा व्हॉट्सअप वा फेसबुकवर आधीच वाचलेल्या – आजही परत वाचताना तेवढ्याच फ्रेश, तेवढ्याच नितांतसुंदर पुन:प्रत्ययाचा आनंद देणाऱ्या, तर काही पहिल्यांदाच भेटीला आलेल्या.

दीपकजींच्या कथांचं वैशिष्ट्य हे की या कथा तुमच्या माझ्या घरात घडतात.

मुलांनी शिकून सवरून परदेशी जाणं – तिथेच स्थायिक होणं, वृद्ध आई वडिलांना परदेशात न करमणं, आणि मग त्यातून आई वडील आणि पुढच्या पिढीची होणारी तगमग हे सांगणारी कथा, स्वार्थी भावंडं, पत्नीच्या निधनानंतर पक्षाघाताने असहाय्य झालेले वडील आणि सज्जन भाऊ / मुलगा यांच्यातली मानसिक ओढाताण याची कथा, आपण भोगलेल्या हालअपेष्टा मुलांना सोसायला लागू नयेत, यासाठी खपणारे आई वडील, त्यासाठी प्रसंगी मुलांना थोडी जास्तच सूट देणारे आई वडील आणि ती मुलं यांचा प्रवास, घरात धुणीभांडी करणारी बाई, तिचा दारुडा नवरा, त्यांची चुणचुणीत हुशार मुलगी – आणि या मुलीने शिकावं म्हणून आग्रह धरणारा त्या मोलकरणीचा पोशिंदा, मध्यमवर्गीय घर, नेहमीचीच आर्थिक ओढाताण, त्यामुळे कायमच साध्या साध्या अपेक्षांवरतीही सोडावे लागणारे पाणी आणि त्यातून नवरा बायको मुलं यांच्यात होणारे वाद, विवाद आणि विसंवाद वंशाचा मतिमंद दिवा आणि दोन मुली, पत्नीच्या निधनानंतर मुलांची आबाळ होऊ नये म्हणून वडिलांचा दुसरा लग्न करायला नकार, काय होते या मुलांचे आणि वडिलांचे पुढे – त्याची कथा सुरेल आवाजाची देणगी लाभलेली परंतु शारीरिक व्यंग असणारी धाकटी बहीण, मतलबी आणि स्वार्थी मोठी बहीण, मध्यमवर्गीय आई वडील आणि त्यांचा आयुष्यातील चढउतार.

एका लग्नप्रसंगी शाळेतल्या बेंच पार्टनरची पुन्हा झालेली भेट, त्यातला एक जण यशाच्या पायऱ्या चढत गेलेला क्लास वन ऑफिसर म्हणून रिटायर झालेला, खाऊन पिऊन श्रीमंत आणि दुसरा “ए फॉर एप्पल, बी फॉर बाल” म्हणणारा शालेय शिक्षक, मुख्याध्यापक म्हणून निवृत्त झालेला. दोघेही शाळेनंतर पहिल्यांदाच भेटतात आणि आपापल्या जीवन प्रवासाची तुलना करतात ती कथा….

कथानकातील पात्रांच्या आयुष्यातील अडचणी दीपकजी खूप रंगवत नेतात, यातून त्यांची कशी सुटका होणार ही उत्कंठा आपल्याला लागून राहते, पण तितक्याच कौशल्याने, निरगाठ उकल तंत्राने ते कथेचा (बहुतेक वेळा) सुखान्त करतात, they live happily ever after, आणि आपलाही जीव भांड्यात पडतो.

माझी फिल्लमबाजी या स्टँड अप शोमध्ये शिरीष कणेकर म्हणायचे की भोवतालच्या आयुष्यात इतक्या कटकटी आहेत, इतके त्रास आहेत, इतका अंधकार दाटलेला आहे की निदान चित्रपटाच्या आभासी दुनियामध्येतरी सच्चाईचा विजय होताना, हिरो जिंकताना बघताना आपण आपल्या मनाचे समाधान करून घेतो, आपल्याला आनंद होतो.

दीपकजींच्या पुस्तकांचे तसंच आहे, त्यांची पुस्तकं वाचून आपल्या मनात एक आशावाद जिवंत राहतो की जसा या कथांमध्ये सत्याचा विजय होतो, तसंच आपल्याही आयुष्यात काहीतरी छान घडेल, आपण मेहनत मात्र घेतली पाहिजे.

मनाला उभारी देणाऱ्या “चिकन सूप फॉर सोल” च्या तोडीस तोड दीपकजींची “रंग हळव्या मनाचे” सहित सर्वच पुस्तकं आवर्जून वाचलीच पाहिजेत.

परिचय –  श्री मकरंद पिंपुटकर

चिंचवड, पुणे.  मो 8698053215

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – पुस्तकांवर बोलू काही ☆ “इग्नाइट युअर इनर पॉवर” – इंग्रजी लेखिका : प्रीती पाठक – अनुवाद : आरती देवगावकर  ☆ परिचय –  श्री हर्षल सुरेश भानुशाली ☆

श्री हर्षल सुरेश भानुशाली

? पुस्तकावर बोलू काही ?

☆ “इग्नाइट युअर इनर पॉवर” – इंग्रजी लेखिका : प्रीती पाठक – अनुवाद : आरती देवगावकर  ☆ परिचय –  श्री हर्षल सुरेश भानुशाली ☆

पुस्तक : इग्नाइट युवर इनर पॉवर

लेखिका : प्रीती पाठक 

अनुवाद : आरती देवगांवकर 

पृष्ठ: २४४

मूल्य: ३५०₹ 

“ इग्नाइट युवर इनर पॉवर “ या पुस्तकाचे वेगळेपण म्हणजे…. लेखिका प्रीतीचे 4A सजगता प्रारूप हे चार स्तंभांवर आधारित आहे :—

जागरूक राहा,

स्वीकारा,

कृती करा,

आणि सुधारणा करा.

आपण बहुतेक वेळा आपल्या भावना, संवेदना आणि दृष्टिकोनांकडे दुर्लक्ष करतो. भावनांबद्दल सजग राहणे ही गोष्ट आपल्याला आपण अनुभवत असलेल्या भावना आणि संवेदना किंवा आपण विकसित केलेल्या दृष्टिकोनांबद्दल जागरूक होण्यास मदत करते. जागरुकता आपले मन स्वीकारशील बनवते. आपल्याला काय, का आणि कसे वाटते, याचा स्वीकार करण्याऐवजी ते नाकारण्याकडे आपला कल असतो. त्यामुळे आपली नव्वद टक्के लढाई स्वतःशीच असते. पण आपल्या भावनांचा स्वीकार करून, आपण सकारात्मक त्वरित कृतीसह आपल्या समस्यांवर मात करण्यासाठी आणि आपले आयुष्य सुधारण्यासाठी स्वतला सक्षम कसे बनवू शकतो.. हे या पुस्तकातून सहजतेने समजू शकेल.

प्रीती त्यांच्या सोप्या आणि सुस्पष्ट शैलीत आपल्या मनात निर्माण होणाऱ्या भावनिक आरोग्यावरील प्रत्येक प्रश्नाचे उत्तर देतात. जीवनाच्या विविध क्षेत्रांतील नामवंत व्यक्तींनी सांगितलेल्या प्रेरणादायी केस स्टडीजने या पुस्तकाचे वाचन मनोरंजक झाले आहे. त्याचे तपशील असे — 

१. अहंकार : व्यंकटेश श्रीनिवासन यांची केस स्टडी

२. संवाद : तारा वर्मा सेनगुप्ता यांची केस स्टडी

३. आत्मविश्वास किश्वर नेन्सी यांची केस स्टडी 

४. मूल्ये: व्यंकटेश श्रीनिवासन यांची केस स्टडी 

५. विश्वास : ग्रुप कॅप्टन डी. पी. आपटे (निवृत्त) यांची केस स्टडी 

६. आदर: डॉ. रचना यांची केस स्टडी 

७. धैर्य : रिषी वोहरा यांची केस स्टडी 

८. प्रेरणा : सुमिती टंडन यांची केस स्टडी

९. शिस्त : खुशबू जैन टिब्रेवाला यांची केस स्टडी 

१०. राग : खुशबू जैन टिब्रेवाला यांची केस स्टडी 

११. भीती : ग्रँडमास्टर विदित गुजराती यांची केस स्टडी

१२. टीका : तारा वर्मा सेनगुप्ता यांची केस स्टडी

१३. मत्सर: रजनी अरुणकुमार यांची केस स्टडी

१४. जजमेंटल असणे तारा वर्मा सेनगुप्ता यांची केस स्टडी

१५. स्वामित्वदर्शक स्वभाव रजनी अरुणकुमार यांची केस स्टडी

१६. प्रेम: रिषी वोहरा यांची केस स्टडी

१७. द्वेष : दिलीप आर्य यांची केस स्टडी

१८. असुरक्षितता : अनिल वोहरा यांची केस स्टडी

१९. करुणा: किरण मनरल यांची केस स्टडी

२०. क्षमा अनिल वोहरा यांची केस स्टडी

२१. अनुभूती: संगीता दासगुप्ता यांची केस स्टडी

२२. मदत : प्रमोद तानवडे यांची केस स्टडी

२३. अवलंबून असणे अमृता ए. वीर यांची केस स्टडी

२४. विकास : अनिल वोहरा यांची केस स्टडी

२५. समुपदेशन : प्रमोद तानवडे यांची केस स्टडी

२६. संतुलित भावना: ग्रँडमास्टर विदित गुजराती यांची केस स्टडी

२७. तणावमुक्त जगणे: ग्रँडमास्टर विदित गुजराती यांची केस स्टडी

२८. समग्र राहणीमान डॉ. कृती मरोळी यांची केस स्टडी

पुस्तकावरील अभिप्राय — 

१. इग्नाइट युवर इनर पॉवर : जागरूकतेने जगण्याची कला’ हा चार प्रभावी पाय-यांमध्ये जागरूकतेचा सराव करून सशक्त जीवन जगण्यासाठी अत्यंत उपयुक्त ग्रंथ आहे.

– शिवी वर्मा, संपादक, लाईफ पॉझिटिव्ह

२. इग्नाइट युवर इनर पॉवर : जागरूकतेने जगण्याची कला’ ही एक उत्कृष्ट कलाकृती आहे. प्रीती तिच्या अनोख्या शैलीत आनंदी आणि अर्थपूर्ण जीवनाचे साधे सार प्रकाशात आणते.

– दिलीप आर्य, अभिनेता

तुमची आंतरिक शक्ती प्रज्वलित करा… ही मनापासून जगण्याची कला आहे … तिचा रोजचा सराव मात्र करायला हवा 

परिचय : श्री हर्षल सुरेश भानुशाली

पालघर 

मो. 9619800030

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – पुस्तकांवर बोलू काही ☆ “हुंकार काळजाचा” – (कविता-संग्रह) – कवयित्री : डॉ. शैलजा करोडे – परिचय : कवी / गझलकार अ. के. शेख ☆ परिचय – सौ. उज्ज्वला केळकर ☆

सौ. उज्ज्वला केळकर

? पुस्तकांवर बोलू काही ?

☆ “हुंकार काळजाचा” – (कविता-संग्रह) – कवयित्री : डॉ. शैलजा करोडे – परिचय : कवी / गझलकार अ. के. शेख ☆ परिचय – सौ. उज्ज्वला केळकर

पुस्तक : हुंकार काळजाचा – (कविता-संग्रह) 

कवयित्री : डॉ शैलजा करोडे

प्रकाशक : अभिनंदन प्रकाशन कोल्हापूर

पृष्ठसंख्या 200

मूल्य ₹ 440

जेष्ठ कवयित्री शैलजा करोडे यांचा ” हुंकार काळजाचा ” या नावाचा कविता संग्रह नुकताच प्रकाशित झाला. त्या नेरूळच्या आहेत. अभिनंदन प्रकाशन कोल्हापूरने हा संग्रह प्रकाशित केला आहे. या संग्रहात 100 कविता आहेत आणि 200 पानांच्या या संग्रहाचे मूल्य आहे रू. 440. मॅडमच्या नावावर पुष्कळशी ग्रंथसंपदा असून हे त्यांचे 21 वे पुस्तक आहे.

आपल्या पहिल्याच कवितेत त्या म्हणतात.

नभावरी खुलतसे इंद्रधनूची कमान

बांधियले कोणी असे नभी मंगल तोरण

अशा निसर्ग वर्णनाच्या कविता तर आहेतच त्याचबरोबर माणसाला आधार देणार्‍याही कविता आहेत, पाहा

जावे संकटा सामोरे मन करूनीया धीट

दुःखानेच कळत असे गोडी सुखाची अवीट

या संग्रहात अशा संस्कारी, प्रासादिक आणि मनाला भावणार्‍या कविता आहेत. जेव्हा उत्कट भावनांना त्यांचे विचार व विचारांना त्यांचे शब्द गवसतात तेव्हा कवितेचा जन्म होतो. या भावनांचे प्रकटीकरण जितक्या तीव्रतेने होते, तेवढा त्याचा कलात्मक आनंदही उंचीवरचा आणि वेगळा. केवळ दर्द नव्हे तर भावनांचा कल्लोळ व्यक्त करण्याची क्षमता कवीच्या ठायी असणे आणि त्यासाठी प्रज्ञेचीही जोड मिळणे, या गोष्टी निर्मिती प्रक्रीयेत महत्वाच्या ठरतात. मग लेखणीही लिहायला आतुर होते. पाहा—

“लेखणी माझी बनते कधी रसाळ मधुर

जणू ओघळते त्यातून दिव्य अमृताची धार”

कवितेचा भवतालाशी त्यातील घडामोडींशी, त्यातील अंतर्गत ताण तणावाशी संबंध असतोच. हे ताण तणावही निर्मिती प्रक्रीयेत महत्वाची भूमिका बजावतात. कवी लिहितांना कवी एका अद् भुताच्या प्रदेशातील सफरीवर निघतो. तिथे आधी कितीतरी वेळा जाऊन आलेले असतांनाही त्याला अनेकदा आधी अनुभवलेलेच पुन्हा गवसते, एका नव्या रूपाने. त्यामुळे व्यक्त होणार्‍या कवितेला अनेक पदर सुटतात. ज्याला जो भावेल तो त्याचा पदर. कोणाही रसिकाला कलेपासून मिळणारा आनंद घेण्याची क्षमता साध्य असावी लागते.

“कुणीतरी हवं असतं मन रितं करायला

हळव्या मनावरती फुंकर घालायला”

यातील सर्व कविता या अशाच आपल्या अवती भवतीच्या विषयांवरच्याच आहेत. त्यामुळे त्या आपल्या वाटतात. “आई कुठे काय करते” म्हटले की आपली आई आठवते. दिवसभर राब राबूनही तिला काय काम करते सांगता येत नाही. असेच सर्व विषय साध्या सोप्या शब्दात मांडलेले आहेत. विशेष म्हणजे या कविता सुबोध आहेत, दुर्बोध नाहीत. सहजच त्या सांगून जातात.

“दया करूणा मनी वसू द्या सफल होईल हा मानवजन्म

समाधान वसेल अंतःकरणी कशाला हवा पुनर्जन्म”

काळाच्या ओघात कविता ही कवीच्या जगण्याचा, सुखदुःखाचा किंवा त्याच्या अस्तित्वाचा एक अविभाज्य हिस्सा बनून जाते. कारण ती कवीच्या जीवनाच्या समृद्ध अनुभवातून, चिंतनातून निर्माण होत असते. हा संग्रह आणि त्यातील कविता अशाच आहेत. त्यामध्ये मानवी मनाच्या विविध पैलूंचे यथार्थ चित्रण प्रतिबिंबित होतांना दिसते. तसेच या कवयित्री नुसत्या कविता लिहिणार्‍या नव्हेत तर कविता जगणार्‍या कवयित्री आहेत. पाहा

“एक कप तो चहाचा वाढवी मैत्रीतील दृढता

गप्पा टप्पा समवेत आस्वाद चहाचा घेता” 

चहाची जशी त्यांना गोडी आहे, तशा त्या रसिकही आहेत.

“कमलदलासम उमलती 

अलगद तुझी ओठ कळी

रूप तुझे न्याहाळतो 

मम दोही नेत्रकमळी”

अशा या 101 कविता लयबद्ध आहेत. त्यात चाराक्षरी, पष्टाक्षरी, अष्टाक्षरी दशाक्षरी अशा रचना आहेत आणि त्या सर्व रसिकांना आवडतील अशाच आहेत. तर हा सग्रह घ्या, वाचा, आनंद लुटा.

“विश्वास ठेवण्यास शिका, विश्वासाने जगा

माणुसकी धर्म मोठा, विसरा सारा त्रागा”

परिचय : कवी / गझलकार अ. के. शेख, पनवेल

प्रस्तुती : सौ. उज्ज्वला केळकर 

संपर्क – निलगिरी, सी-५ , बिल्डिंग नं २९, ०-३  सेक्टर – ५, सी. बी. डी. –  नवी मुंबई , पिन – ४००६१४ महाराष्ट्र

मो. 836 925 2454, email-id – kelkar1234@gmail.com 

≈संपादक –  श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – पुस्तकांवर बोलू काही ☆ “सेवा समर्पण” – संपादन : सुश्री निवेदिता भिडे – अनुवाद : सुश्री सुनीता करकरे ☆ परिचय – श्री हर्षल सुरेश भानुशाली☆

श्री हर्षल सुरेश भानुशाली

? पुस्तकावर बोलू काही ?

☆ “सेवा समर्पण” – संपादन : सुश्री निवेदिता भिडे – अनुवाद : सुश्री सुनीता करकरे ☆ परिचय –  श्री हर्षल सुरेश भानुशाली ☆

पुस्तक : सेवा समर्पण

 (सामाजिक कार्य करणाऱ्या कार्यकर्त्यांसाठी मार्गदर्शक पुस्तक)

संपादन : सुश्री निवेदिता भिडे 

अनुवाद : सुश्री सुनीता करकरे

प्रकाशक : विवेकानंद केंद्र

पृष्ठे : ४००

मूल्य : ३००/- रुपये

सेवा समर्पण आध्यात्मिक जीवनाची साधना – – – 

कन्याकुमारी येथे विवेकानंद शिला स्मारक बघण्यासाठी आपल्यापैकी अनेक जण जाऊन आले असतील. त्या शिला स्मारकाचे सर्व काम विवेकानंद केंद्रातर्फे पाहिले जाते.

१९७२ मध्ये स्थापन झालेल्या विवेकानंद केंद्रातर्फे देशभरात संस्कारवर्ग, योग प्रशिक्षण, शाळा असे अनेक प्रकारचे सामाजिक, शैक्षणिक कार्य केले जाते.

विवेकानंद केंद्राचे संस्थापक मा. एकनाथजी रानडे यांनी केंद्राच्या पूर्णकालीन कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करण्यासाठी ४० दिवसांची व्याख्यान-माला घेतली होती. त्या व्याख्यानमालेचे हे पुस्तकरूपी संकलन आहे.

हे पुस्तक फक्त विवेकानंद केंद्राच्या कार्यकर्त्यांनी वाचावे असे नाही, तर कोणत्याही सामाजिक संघटनेच्या कार्यकर्त्यांनी वाचावे, एवढे महत्त्वपूर्ण आहे.

या पुस्तकात चार भाग आहेत. या चार भागांमध्ये ३० लेखांचा समावेश आहे.

१) आध्यात्मिक जीवनासाठी तयारी या भागात दोन लेख आहेत.

२) जीवनाचा प्रवासः स्वार्थाकडून निःस्वार्थतेकडे: या भागात नऊ लेख आहेत.

३) अध्यात्मप्रेरित सेवा संघटना या भागात आठ लेख आहेत.

४) संघटकांची साधना या भागात ११ लेख आहेत.

जीवनाच्या उषःकाली आपल्या जीवनाची योजना बनवता येणे ही मोठीच दैवी देणगी होय. आपल्यासमोर काही उद्दिष्ट नसेल, गंतव्यस्थान निश्चित केलेले नसेल, ध्येय निश्चित नसेल, तर आपण क्षणिक जीवन जगत असतो.

आपण शेकडो गोष्टी करू शकतो, पण त्यातील फक्त एकाचीच निवड करून ती गोष्ट कार्यवाहीत आणण्यासाठी, त्याचा योग्य तो आराखडा तयार करावा लागेल. त्या उद्दिष्टाच्या रोखाने व्यवस्थित वाटचाल सुरू केली, की स्वतःमधील अनेक सुप्त गुण आपल्या लक्षात येतील.

आकलनशक्ती, विचारातील लवचिकता, स्वतःवरील विश्वास, आत्मविश्वास असेल, तर वाटेल ते अडथळे येवोत, त्या अडथळ्यांवर मात करून आपण आपल्या ध्येयाप्रत निश्चित पोहोचू शकू.

आपल्या आयुष्यातील केवळ काही वर्षांचा कृतिशील वेळ आपल्याला मिळतो. तेवढ्या अवधीत आपले नियोजित रचनात्मक कार्य पूर्ण करावयाचे आहे. सांघिक वृत्तीने कार्य करीत असताना संकुचित मनोवृत्तीचे कवच भेदून स्थिरपणे, भयरहित, अविचलपणे कार्यरत असताना जरी अपयश आल्यासारखे वाटले, तरी निराशा किंवा उदासीनता येण्याचे कारणच नाही.

स्वामी विवेकानंद म्हणतात, ‘तेच फक्त जगतात, जे दुसऱ्यासाठी जगतात. इतर सारे जगत असूनही मृतप्राय होत. दुसऱ्यासाठी जगणं म्हणजे काय, तर आपला वेळ आणि शक्ती इतरांसाठी खर्ची टाकणं. ‘

…… म्हणजेच ‘सेवा समर्पण’!

परिचय : श्री हर्षल सुरेश भानुशाली

पालघर 

मो. 9619800030

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – पुस्तकांवर बोलू काही ☆ “कर्ता – करविता…. आधुनिक मेंदूसंशोधन व आपले जीवन” – लेखिका : सुश्री अनिता देशमुख / सुश्री राजश्री क्षीरसागर -परिचय : श्री रमेश पानसे ☆ प्रस्तुती –  श्री हर्षल सुरेश भानुशाली☆

श्री हर्षल सुरेश भानुशाली

? पुस्तकावर बोलू काही ?

☆ “कर्ता – करविता…. आधुनिक मेंदूसंशोधन व आपले जीवन” – लेखिका : सुश्री अनिता देशमुख / सुश्री राजश्री क्षीरसागर –परिचय : श्री रमेश पानसे ☆ प्रस्तुती –  श्री हर्षल सुरेश भानुशाली ☆

पुस्तक :  कर्ता – करविता…. आधुनिक मेंदूसंशोधन व आपले जीवन

लेखिका : सुश्री अनिता देशमुख, सुश्री राजश्री क्षीरसागर.

प्रकाशक : अर्थविज्ञानवर्धिनी 

पृष्ठ:२४२

मूल्य: ५००₹ 

आधुनिक मेंदू संशोधन आणि त्याचा आपल्या जीवनाच्या विविध अंगांशी असलेला, शास्त्रांमध्ये नव्याने प्रस्थापित होत असलेला संबंध दाखवून देण्यासाठी ‘कर्ता-करविता’ या पुस्तकाची रचना केली. या अगदी नवीन अशा विषयाचे स्वागत मराठी वाचकांनी उत्तमरीत्या केले. पहिली आवृत्तीही खूप लवकर संपली. मध्यंतरी बराच काळ हवे असूनही, मागणी करणा-यांना हे पुस्तक उपलब्ध होत नव्हते. यामुळे, भारतीय अर्थविज्ञानवर्धिनीने याची दुसरी आवृत्ती प्रकाशित करण्याचा निर्णय घेतला.

विसाव्या शतकाच्या अखेरचे दशक हे मेदूसंशोधन दशक म्हणून गौरविले गेले आहे. आता तर, मेंदूसंशोधनाचे दशक संपूनही दहा वर्षे होऊन गेली आहेत. या गेल्या दहा वर्षांमध्ये, मेंदूविषयक संशोधन वेगाने पुढे सरकले आहे. मेंदूची रचना आणि मेंदूची कार्ये अधिक खोलवरू न अभ्यासण्याचा प्रयत्न चालला आहे. या अभ्यासांचे निष्कर्ष आणि त्यावर आधारित अशी मानवी जीवनाची आणखी खोलवरचे पदर उलगडणारी भाकिते हा अलीकडच्या काळातील शास्त्रीय वाङ्मयातील वाढता पसारा आहे. मज्जाविषयक संशोधनांनी इतर अनेक सामाजिक शास्त्रांवर आणि त्यांमधील अभ्यासांवर प्रभाव टाकलेला आहे. मेंदू अधिकाधिक उलगडत चालल्यामुळे एका अर्थी माणूसच उलगडत चालला आहे. माणसाचे विचार, माणसाचे वर्तन, माणसाच्या भावना आणि माणसांचे परस्पर सामाजिक संबंध यांच्या संदर्भातील काही कारणमीमांसा मेंदूशास्त्राच्या आधारे करणे शक्य होत आहे. त्यामुळे या दिशेने सामाजिक शास्त्रांमध्ये नवे काही घडू लागले आहे.

या पुस्तकाच्या २००६ साली झालेल्या प्रकाशनानंतर दखल घ्यावी अशी एक गोष्ट शिक्षणाच्या क्षेत्रात घडून येत आहे. एकीकडे मेंदूआधारित शिक्षणाच्या तंत्र-मंत्राचा प्रसार होत असतानाच, शिक्षक घडविणा-या प्रशिक्षण अभ्यासक्रमांमध्ये, आधुनिक मेंदूसंशोधन व त्याचे शैक्षणिक पर्यवसान सांगणा-या अभ्यास घटकाचा समावेश करण्यात आला आहे. शिक्षणाला योग्य दिशेने नेणारीच ही घटना आहे. जिज्ञासू वाचकांप्रमाणेच, या घटनेशी संबंधित असणा-या शिक्षण महाविद्यालयांना, त्यांमधील शिक्षक व विद्यार्थी यांना यामुळेच ‘कर्ता-करविता’ हे पुस्तक अधिक नेमकेपणाने उपयुक्त ठरणारे आहे.

अनुक्रमणिका :

  • आपण आणि आपला मेंदू डॉ. ह. वि सरदेसाई
  • क्रांतिकारक मेंदूसंशोधन : रमेश पानसे

इतिहास व उत्क्रांती

१. मेंदूची उत्क्रांती

२ असा आहे आपला मेंदू

३ व्यक्तिमत्व व जनुकांचे कार्य

जडणघडण

४ गर्भावस्थेतील जडणघडण

५ बालमेंदू संगोपन

६ भाषाशिक्षणाचा उगम

७ बुद्धिवर्धक आहार

विचारनिर्मिती

८ भावनांची निर्मिती

९ हातवारे-हावभाव आणि विचार

१० मूक अभिनयातून भाषेची उत्क्रांती

११ विचारनिर्मिती

१२ होल ब्रेन थिंकिंग

१३ कलानिर्मिती

शिक्षण

१४ बहुविध बुद्धिमत्ता

१५ नादलहरींच्या हिंदोळ्यावर

१६ मेंदूसंशोधन व शिक्षण

जैविक घड्याळाचे केंद्र

१७ जैविक घड्याळ

१८ जनुकीय आजार

१९ चेहरे ओळखण्याचे केंद्र

२० संप्रेरकामुळे येणारे स्थूलत्व

२१ व्यायाम वाढवी मेंदूची कार्यक्षमता

२२ बुद्धिमान पक्षी

जाणिवांच्या शोधात…

२३ जाणिवांचे विज्ञान

२४ जाणिवांचा उगम

२५ ध्यानधारणेतील मेंदूसंशोधन

२६ श्रध्देला मरण का नाही?

कृत्रिम बुद्धिमत्ता

२७ कृत्रिम बुद्धिमत्तेकडे…

२८ ग्लोबल ब्रेन

(अनुक्रमणिकेवरून या पुस्तकाच्या विषयाची व्याप्ती लक्षात यावी म्हणून तिचा समावेश परिचयात केला आहे.)

परिचय : श्री रमेश पानसे

प्रस्तुती : श्री हर्षल सुरेश भानुशाली

पालघर 

मो. 9619800030

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – पुस्तकांवर बोलू काही ☆ “दशक्रिया” – लेखक: बाबा भांड  ☆ परिचय –  श्री अ. ल. देशपांडे ☆

श्री अ. ल. देशपांडे

?पुस्तकावर बोलू काही?

☆ “दशक्रिया” – लेखक: बाबा भांड  ☆ परिचय –  श्री अ. ल. देशपांडे ☆ 

पुस्तक : दशक्रिया 

लेखक : बाबा भांड 

किंमत : रु २३० 

पृष्ठ संख्या : २१६ 

प्रकाशक : साकेत प्रकाशन 

बरेच दिवसानंतर एक छान, गावकुसातील लहान सहान परंतू महान या श्रेणीतील घटनांचा अंतर्कल्लोळ ऐकायला मिळाला, वाचायला मिळाला.

श्री बाबा भांड

(महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळाचे सन्माननीय अध्यक्षपद भूषविलेले श्री बाबा भांड हे प्रसिद्ध लेखक पण आहेत . त्यांच्या दशक्रिया ह्या कादंबरीवर सिनेमा पण निघाला आहे.!)

पैठण पुष्य-नगरीचे घाट, घाटावरील बारीक सारीक घडामोडी, मानवी जगण्याच्या संवेद‌ना, आगतिकता, अपरिहार्यता, सामाजिक भान, परस्परांचे हित जपत जपतच जगू शकण्याचे भान, सामाजिक विषमतेचा पट घट्ट विणलेली परिस्थिति, त्याचा भेद न करू शकलेले वर्तमान, सामान्यांची, अतिसामान्यांची दैनंदिन जगरहाठीत होत असलेली ससेहोलपट, उगवलेला दिवस केंव्हा मावळतो हेच असहाय्यपणे पहाणारे मानवी जीव, किरवंत म्हणूनच जीवन जगण्याचे नशिबी आलेले रोबोट सदृश्य निराकार चेहऱ्यावरील भाव उडून गेलेले जीव, एकेकाळचे समृद्ध, संपन्न, उन्मादाने जीवन जगलेल्या सावकारांच्या नशिबी आलेले भिक्षापात्र, परंपरेने भाळी आलेले क्रिया-कर्म करण्याशिवाय तरणोपाय नसलेल्या ब्रह्मवृंदाची पीठं, ती (पीठं) सांभाळणा-यांची पुढील पिढी आणि भानुदास नामें शाळकरी मुलाच्या समंजस जीवनसंघर्षाची ही ‘ दशक्रिया ’ नावाची अत्यंत वाचनीय अशी कहाणी वाचून खूप समाधान पावलो आहे.

मी स्वतः बाराबलुतेदार असलेल्या गावाचा रहिवासी शेतकऱ्याचा मुलगा असल्यामुळे व खेड्याशी अद्यापही नाळ जुळून असल्यामुळे दशक्रियेतील घटनांचा साक्षी असल्याचे जाणवले. ग्रामीणांच्या तोंडी असलेली बोलीभाषा ही व-हाडी बोलीभाषेचीच मावशी असल्याचे जाणव‌ले. ही भाषा बोलणा-यांची दुर्द‌शाच असते हे माहित असुनही भाषा सौष्ठव, सौंदर्य त्यातील थोडे का होईना मार्दव हे निदान माझ्या सारख्या ग्रामीणाला आंदोलित करते. कुठेतरी ममत्व दडलेलं असल्याचा भास होतो. आणि वर्षानुवर्षे लोटलीत तरीही थेट ग्रामीणांच्या जीवन संघर्षात फारसा बदल नसलेल्याचे पाहून मन विषण्ण होते.

कांदबरी वाचतांना खूप पुढे गेल्यावर अनेक प्रश्न लेखकाला विचारावेसे वाटतात आणि सर्वसाधारण प्रथम पृष्ठा-वर असलेले लेखकाचे मनोगत “ एका कादंबरीची क्रिया व लेखन – प्रक्रिया “ ह्या रूपात जेव्हा वाचकांचे वाचून पूर्ण होते त्यावेळी त्याच्या मनातील प्रश्नांचा लोप होतो. त्याला प्रश्नांची उत्तरं मिळालेली असतात. लेखकाच्या प्रामाणिक प्रयत्नांची दाद द्याविशी वाटते आणि ‘मनोगत’ हे शेवटी दिले असल्याने वाचकाच्या बुध्दिला सुध्दा अनेक पैलूंवर विचार करण्याचे स्वातंत्र्य आपोआपच मिळते. सुरुवातीपासून शेवटपर्यंत वाचक झपाटलेल्या मनःस्थितित राहतो.

आणि शेवटी कुणाच्या तरी मरणातच फक्त आनंद मिळविणारा भानुदास सूरपारंब्या सोबतच खेळलेल्या शकूच्या अस्थि पाहून थीजून जातो व वाचकाचे आंदोलित झालेले मन अखेरीस पाणाव‌लेले डोळे टिपू लागतात 

परिचय : अ. ल. देशपांडे, अमरावती (व-हाड)

संपर्क – “मथुरा”, मकान नंबर 4, विनोद स्टेट बैंक कॉलोनी, कैंप, अमरावती, महाराष्ट्र – 444602

मो. 92257 05884

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – पुस्तकांवर बोलू काही ☆ “चार नगरातले माझे विश्व – (आत्मचरित्र) लेखक : डॉ. जयंत नारळीकर ☆

सौ राधिका भांडारकर

?पुस्तकावर बोलू काही?

☆ “चार नगरातले माझे विश्व – (आत्मचरित्र) लेखक : डॉ. जयंत नारळीकर ☆ 

पुस्तक परिचय

पुस्तक : चार नगरातले माझे विश्व 

लेखक : जयंत विष्णू नारळीकर

प्रकाशक : मौज प्रकाशन 

पृष्ठसंख्या : ५४६.

वास्तविक डॉ. जयंत नारळीकर हे वैज्ञानिक म्हणून, विशेषत: खगोलशास्त्रज्ञ म्हणून उल्लेखनीय अंत:राष्ट्रीय किर्तीचे संशोधक म्हणून तुम्हा आम्हा सर्वांनाच परिचित आहेत. परंतु त्यांच्या या आत्मकथनातून आपल्याला त्यांच्या विशेष व्यक्तीमत्वाची ओळख होत जाते…

चार नगरातील माझे विश्व… ही आकाशाशी नाते जडलेल्या पण पूर्णपणे धरणीवर असणार्‍या, साध्या सभ्य, सज्जन माणसाची यशोगाथा वाचताना, त्यांच्या व्यक्तीमत्वाचे अनेकविध कप्पे, इतक्या सहजपणे उलगडत जातात कि मग, ही व्यक्ती दूरस्थ न राहता, एक वेगळेच नाते आपलेही त्यांच्याशी जुळून जाते.

चार नगरातले विश्व म्हणजे नारळीकरांच्या आयुष्यातले चार महत्वाचे टप्पे,..

नारळीकर मूळचे कुठले या अनुत्तरीत प्रश्नापासून या आत्मवृत्ताची सुरवात होते. पाटगाव हे त्यांचे मूळ गाव.

नारळीकरांच्या परसात आंब्याची झाडे होती. त्या झाडाला नारळाएव्हढे आंबे लागत म्हणून हे नारळीकर..

बनारस हे त्यांच्या शालेय शिक्षणाचे विश्व.

बी. एस्सी. पदवीप्राप्तीनंतर, ऊच्च शिक्षणासाठी, प्रचंड महत्वाकांक्षा मनात ठेउन केलेले केंब्रीजमधले पदार्पण हे दुसरे विश्व. रँग्लर किताब, टायसन, स्मिथ अॅडम्स, आणि इतर अनेक सर्वोच्च मानाचे पुरस्कार मिळवत.

खगोलशास्त्रातील सापेक्षतावाद, गुरुत्वाकर्षण, विश्वरचनातंत्र यामधे अलौकिक संशोधनाचे टप्पे गाठत, करीअरचा आलेख सदैव उंचावर ठेवत गेल्याचा काळ म्हणजे त्यांचे चौदा पंधरा वर्षाचे केंब्रीजमधले वास्तव्य.. यात त्यांनी वैयक्तिक स्वरुपात केलेली मनोरंजक प्रवास वर्णने आहेत. त्यांनी गाजवलेल्या अनेक वैज्ञानिक परिषदेचे सुरस तपशील आहेत. त्यांच्या संशोधनाविषयीचं लेखन उत्कंठावर्धक, रसपूर्ण आहे.

एका परिषदेत, एकदा एका इंग्लीश प्राध्यापकाने त्यांना व एका पाकिस्तानी विद्यार्थ्याला विचारले,

“भारताचे विभाजन झाले तेव्हां ज्या, हिंदु, मुस्लीम, शीखांच्या कत्तली झाल्या त्या भारताला किंवा पाकिस्तानला कां थांबवता आल्या नाहीत? “

तेव्हा नारळीकर ताबडतोब उत्तरले,

“विभाजन ब्रिटीशांनी घडवून आणले. ते अस्तित्वात येत असताना, कायदा आणि सुव्यवस्था टिकवण्याची जबाबदारी ब्रिटीश सत्तेने पार पाडली असती तर ही दुर्दैवी घटना घडलीच नसती… “

पाकिस्तानी विद्यार्थ्यानेही त्यांच्या या भाष्याला अनुमोदन दिले.

पंधरा सोळा वर्षाचं, अत्त्युच्च मानाचं, सोयीचं, अनेक वैज्ञानिक आवाहने पेलुन स्वत:ला जागतिक कीर्तिच्या

वैज्ञानिकांमधे आणि विज्ञान विश्वात सिध्द केल्यानंतर, भारतात परत येण्याविषयीच. त्यांचं मनोगत मनात कोरलं जातं. ते म्हणतात,

“माझ्या मनात परदेशवास्तव्याबद्दल एक उपरेपणाची भावना घर करत होती. सर्व छान असले तरी ही जागा माझी नाही. इथे मी पाहुणाच आहे. भारतात परतल्यावर विविध गोष्टींबद्दल करावी लागणारी तडजोड विचारात घेउनसुद्धा, तिथे मी आपल्या देशात, आपल्या माणसात असेन ही भावना वरचढ होती… “

१९७२ साली ते भारतात परतले. आणि टाटा इन्स्टीट्युट ऑफ फंडामेंटल रिसर्च (TIFR)या मुंबईस्थित

वैज्ञानिक संस्थेत ते दाखल झाले. भारतसरकारने त्यांचे मनापासून आदराने स्वागत केले. हे तिसरे पर्व! !

आपल्या देशात वावरताना, आत्मविश्वास, आप्तस्वकीयांची जवळीक, होणारे कौतुक या जमेच्या गोष्टी आहेत. आणि याचेच भान त्यांनी राखले म्हणून ते जनसामान्यात लोकप्रिय झाले.

स्वाक्षरी मागणार्‍या विद्यार्थ्यांना ते सांगतात……

“स्वाक्षरी मागण्यापेक्षा तू मला पोस्टकार्ड पाठवून, विज्ञानातला तुला भेडसावणारा, एखादा प्रश्न विचार. मी त्याला उत्तर स्वाक्षरीसकट पाठवेन.. “

पुढे मराठी विज्ञान परिषदेने याच प्रश्नोत्तरावर एक लहानसे पुस्तक त्यांच्याकडून लिहून घेतले. पुस्तकाचे नाव

“पोस्ट कार्डातून विज्ञान”

याशिवाय अनेक विज्ञानकथांचाही उगम त्यांच्याकडून झाला व ती विज्ञानप्रेमी माणसांसाठी पर्वणीच म्हणावी लागेल.

TIFR मधे ते सतरा वर्षे कार्यरत होते. तिथे त्यांनी मनात

ठरवलेल्या आशाआकांक्षा बहुतांशी पुर्‍या झाल्या.

सहवैज्ञानिकांशी त्यांचे सलोख्याचे सबंध राहिले. ते कधी अंतर्गत राजकारण, गटबाजी या भानगडीत पडले नाहीत. त्यांची प्रतिमा, एक साधा सज्जन माणूस.. “अशीच राहिली. आणि आजही ती तशीच आहे.

नेहरु तारांगण ची स्थापना ही एक उल्लेखनीय कामगिरी. करमणुकीतून लोकशिक्षण ही संकल्पना त्यामागे आहे.

TIFR मधे संचालकपदाच्या नेमणुकी बाबत मात्र त्यांच्यासोबत गलीच्छ राजकारण खेळले गेले. ते पद त्यांच्यासाठी डावलले गेले. तेव्हां त्यांना वेदनादायी धक्का बसला. याविषयी त्यांनी सारे पारदर्शीपणे या पुस्तकात लिहीले आहे, ते विलक्षण वाचनीय आहे.

पुण्यात आयुकासाठी(Inter university for astronomy and astrophysics) आलेले आमंत्रण

हे त्यांना त्यांच्या संशोधनात्मक तत्वांसाठी, संकल्पनेसाठी, वैज्ञानिक दृष्टीकोनासाठी

आव्हानात्मक वाटल्यामुळे त्यांनी TIFRआणि मुंबई सोडली. आयुकासाठी पुणे विद्यापीठात जागा मिळवून देण्यापासून ते नियमावली, पदांची नेमणूक, एक साचेबंद,

सर्वसमावेशक घटना बांधण्यापासूनचे सगळे योगदान

नारळीकरांचेच आहे. या चवथ्या पर्वाचा. पुस्तकवाचनातून येणारा हा अनुभवही आनंददायी आहे.

शैक्षणिक, व्यावसायिक, व्यावहारीक, तात्विक, सामाजिक, कौटुंबिक.. असामान्य बुद्धीमत्तेच्या या व्यक्तीने आपल्या लेखनातून या सर्व स्तरांवर त्यांचे असे स्वत:चे ठसे

उमटवले आहेत आणि ते आदर्शवत आहेत…

आज जयंत नारळीकर निवृत्तीच्या मार्गावर आहेत

मागे वळून पाहताना, ताई(आई), तात्यासाहेब(वडील जे केंब्रीजचेच स्कॉलर होते. रँग्लर हा किताब त्यांना मिळालेला होता)त्यांचे गुरु फ्रेड हाॅएल, साहित्यिक

एडवर्ड माॅर्गन फाॅस्टर आणि पत्नीचे काका बाळासाहेब राजवाडे ही त्यांची स्फूर्तीस्थाने आहेत, असे ते आवर्जून सांगतात.

एक प्रश्न त्यांना नेहमी विचारला जातो,

“तुमचा देवावर विश्वास आहे का? “

ते म्हणतात, “देव आणि विश्वास या संकल्पना व्यक्ती सापेक्ष आहेत. एका परम शक्तीने विश्व निर्माण केले,

त्या परमशक्तीला देव म्हणता येईल. “

वैज्ञानिक दृष्टीकोन म्हणजे कुठलाही तर्क प्रत्यक्ष निरीक्षणाने पुष्टी मिळाल्याशिवाय बरोबर मानायचा नाही, आणि त्याचे स्थान टिकवण्यासाठी, वेळोवेळी येणार्‍या भाकीतांची तपासणी करुन मूळ तर्काचे खरेखोटेपण ठरवता येते. यालाच तर्कशुद्ध विचारसरणी म्हणतात.

हे पुस्तक वाचताना एका वैज्ञानिकाबरोबरच, एक तत्वचिंतक आपल्याला भेटतो. गूढतेतून, गहनतेतून, एक

सरळ सोपी प्रकाशवाट दाखवणारा…

खरोखरीच्या या भारतरत्नाला, या दिव्यत्वाच्या प्रचीतीला सदैव कर जुळलेले राहतील…..

आज त्यांच्या दु:खद निधनाची बातमी ऐकून मन बेचैन झाले. मृत्यू अटळ आहे पण आठवणी निरंतर असतात. “चार नगरातले माझे विश्व “या पुस्तकातून झालेली त्यांची ओळख आठवून त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली देते..

परिचय –  सौ. राधिका भांडारकर

ई ८०५ रोहन तरंग, वाकड पुणे ४११०५७ मो. ९४२१५२३६६९ radhikabhandarkar@yahoo.com

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – पुस्तकांवर बोलू काही ☆ “सर्वसाक्षी…” – लेखक : श्री पुरुषोत्तम रामदासी ☆ परिचय – सुश्री सौ राधिका भांडारकर ☆

सौ राधिका भांडारकर

?पुस्तकावर बोलू काही?

☆ “सर्वसाक्षी…” – लेखक : श्री पुरुषोत्तम रामदासी ☆ परिचय – सुश्री सौ राधिका भांडारकर ☆ 

पुस्तक परिचय

पुस्तक : सर्वसाक्षी

लेखक : पुरुषोत्तम रामकृष्ण रामदासी.

प्रकाशक : मिलिंद राजाज्ञा.

प्रथम आवृत्ती :२०२५

पृष्ठे : २६८

माननीय पुरुषोत्तम रामदासी हे मराठी साहित्य क्षेत्रातील एक उल्लेखनीय व्यक्तिमत्व आहे. त्यांच्या दर्जेदार लेखनाचं गारुड नकळत वाचकांच्या मनावर आरुढ होतं. त्यांच्या कथांतून, कादंबरीतून नेहमीच जीवनापलीकडचं काहीतरी गूढ अनुभवायला मिळतं. त्यांनी रंगवलेली पात्रं, घटना, वातावरण हे जरी नेहमीचंच, सर्वसाधारणपणे ओळखीचं असं वरवर वाटलं तरी त्यातून उलगडणारं मानवी जीवन हे अनाकलनीय पण एक सखोल वास्तव दाखवणाऱ्या दिशेला अचूकपणे घेऊन जातं.

कादंबरी हा एक विशेष साहित्य प्रकार आहे. यात मूळ कथेचं एक मुख्य बीज असतं आणि हे बीज अंकुरताना हळूहळू त्यात अनेक वेगवेगळ्या स्वभावाची, निरनिराळ्या विचारांची, पद्धतीची पात्ररुपी रोपं फुलत असतात. प्रत्येक पात्राभोवती कुठलं ना कुठलं कथानक गुंफलेलं असतं. विविध पात्रांच्या नातेसंबंधांना घेऊन जाणाऱ्या या विविध छोट्या कथा मूळ कथानकाशी हळूहळू जुळत जातात आणि एक संपूर्ण कथानक पूर्ण होतं. सर्व पात्रांचा मूळ कथेशी काय संबंध असेल या उत्सुकतेपोटी वाचकांचे वाचन चालू राहतं. मनोमन वाचक सहजपणे अंदाज बांधतो. कधी तो अंदाज खरा ठरतो तर कधी त्यात होणार्‍या विस्मयकारी बदलाने थक्क व्हायला होते. कादंबरी कधी शोकांतिका तर कधी सुखांतिका असते तर कधी या दोन्ही मधलं एक धक्कादायक वास्तवही असू शकतं आणि या कथेशी वाचकाला खिळवून ठेवण्याची भूमिका फक्त आणि फक्त लेखकाचं लेखन कौशल्य, लेखन सामर्थ्य, शब्दांचा आणि विचारांचा ओघच करू शकतो. या सर्वांचा अनुभव प्राध्यापक पुरुषोत्तम रामदासी यांची नुकतीच प्रकाशित झालेली सर्वसाक्षी ही कादंबरी वाचताना येतो.

आदिनाथ गडकरी नावाच्या एका लेखकाची ही कथा आहे. या लेखकाचा मनातल्या मनात कालपुरुषाशी संवाद घडत असतो. काळाने उद्गारलेले शब्द त्याच्या कानात घुमतात. ” मी म्हणजे एक पळ. तुमच्या भाषेत एक क्षण. क्षणाक्षणाची अविरत, अखंड आणि चिरंतन साखळी म्हणजे मी. होय! मी काळ आहे. सर्वसाक्षी काळ! ”

इथूनच आदिनाथ गडकरी या लेखकाला झटकन एक प्रेरणा मिळते आणि हळूहळू त्याच्या जीवनपटाची कहाणी उलगडत जाते.

या कादंबरीत आदिनाथ गडकरी आणि उषा साबणे या दोन व्यक्तींच्या निस्सीम प्रेमाची कहाणी केंद्रस्थानी आहे आणि त्या अनुषंगाने रामराव बेळे, राघव, मंदा बेळे, अंजली, दिगंबर, अनु, केशव, सचिन, निरंजन अशी विविध पात्रे स्वतःची एक एक स्वतंत्र कथा घेऊनच या प्रपंचात समाविष्ट होतात.

मला कादंबरीची संपूर्ण कथा तुम्हाला सांगून तुमच्या वाचनाचा रसभंग करायचा नाही. मला फक्त ही कादंबरी वाचताना काय वाटले तेवढेच सांगायचे आहे.

या कादंबरीतल्या कुठल्याही पात्राभोवती कसलंही वलय नाही. समाजात वावरणारी, नेहमीच भेटणारी ही सारीच साधीसुधी माणसं आहेत. यांच्या जीवनात प्रेम आहे, शृंगार आहे, प्रेमातली फसवणूक आहे, शेजारी, बहीण- भाऊ, माय -लेकी यांच्या मधली नाती आहेत, समाजाने ठरवलेल्या नैतिक चौकटीबाहेरची अनैतिक कर्मं आहेत पण अशा कर्मांनाही अनैतिकतेच्या आवरणातून अलगद बाहेर आणण्याचे, त्यांची कारणमीमांसा देतानाचे शाब्दिक आणि वैचारिक कौशल्य लेखकाने या कादंबरीतून सुरेख पद्धतीने दाखवलं आहे.

आयुष्य म्हणजे ॲबिस आहे हे वाक्य वाचकाच्या मनावर खोल परिणाम करतं. आयुष्याला दिलेली ही कृष्णविवराची, कृष्णदरीची कल्पनाच खूप भिडणारी आहे. वास्तविक “ काळाच्या उदरात दडलंय काय” असा विचार करताना कादंबरीतल्या या एकेका पात्राच्या जीवन डोहात खोलवर जाऊन बघण्याचा लेखकाचा प्रयत्न खरोखरच अलौकिक आहे.

मी कादंबरी अक्षरशः झपाटल्यासारखी एका बैठकीत वाचली. सुरुवातीला वाचताना मला एखादी मसालेदार चित्रफीत पहात आहोत असंच वाटलं कारण यात विवाहबाह्य संबंध आहेत, स्पष्ट संवाद आहेत, भडक नसले तरी अश्लीलता टाळून केलेली शृंगारिक वर्णनं आहेत आणि तरीसुद्धा कथेतला एक सुंदर, कोमल, मनाची घालमेल करणारा प्रेमाचा रेशीम धागाही आहे.

रामराव आणि मंदा यांचे पती पत्नी पलीकडचे वेगळेच नाते, राघवचे नपुंसकत्व, सचिनचा मानसिक पिसाटपणा, सचिन आणि राघव मध्ये अडकलेल्या अंजूची व्यथा… या सर्वांबद्दल वाचकाच्या मनात अनेक प्रश्न उभे राहतात. एक सुंदर रहस्यमयता या कादंबरीत आहे आणि समोर पसरलेल्या विविध पात्ररूपी सुमनांची माळ आपल्यापुढे हळूहळू सहजपणे गुंफत जाते. या पात्रांशी वाचकाचं नकळत नातं जडतं आणि कादंबरीच्या शेवटी सारी नाती एक वेगळाच धडा देत अचंबित करतात. आयुष्याची एक संपूर्ण अनाकलनीय बाजू दाखवतात. लेखकाच्या भाषेत सांगायचं तर “अनाकलनीय घटनांच्या प्रवाहात वाहत जाणाऱ्या वाळक्या पानासारखं वहावं लागतं. कर्तुम अकर्तुम अज्ञात शक्तीविषयीचं हेअज्ञान की वंचना?” असं काहीसं वाटत राहतं.

या कादंबरीचे वैशिष्ट्य असं आहे की यात अवास्तव योगायोग नाहीत, गिमिक्स नाहीत, मेलोड्रामा नाही. लेखकाने पात्रांची निर्मिती केली पण त्यांना त्यांच्या प्रवाहात स्वतंत्रपणे लोटून देत त्यांच्याभोवती घडणाऱ्या घटनांबद्दल सहजपणे, सुंदर शब्दशैलीत भाष्य केले. त्यामुळे या कादंबरीत कुठलीही कृत्रिमता जाणवत नाही. ओढूनताणून केलेलं लेखन वाटत नाही. सहज, प्रवाही आणि परिपक्व असं हे लेखन आहे. प्रसंगानुरूप संवाद, भाषेचा साज चढवत सारं काही खुलत जातं आणि दूरस्थपणे वाचक या संपूर्ण कालचक्राचा एक भाग बनून जातो.

कादंबरीच्या सुरुवातीला काळ बोलत असतो आणि शेवट ही काळाच्या वक्तव्यानेच होतो. काळाच्या साक्षीने सारं काही घडत असतं म्हणून काळच सर्वसाक्षी.

अशी ही प्रा. पुरुषोत्तम रामदासी यांची जीवनावरची सखोल, अभ्यासात्मक, काहीशी अध्यात्मिकतेकडे झुकणारी कादंबरी सर्वांनी जरूर वाचावी अशीच..

या सुंदर लेखनासाठी मा. रामदासी सरांचे मनापासून अभिनंदन आणि त्यांच्या पुढील साहित्यिक वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा!

परिचय –  सौ. राधिका भांडारकर

ई ८०५ रोहन तरंग, वाकड पुणे ४११०५७ मो. ९४२१५२३६६९ radhikabhandarkar@yahoo.com

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – पुस्तकांवर बोलू काही ☆ “भारत – सत्य, सत्व, स्वत्व” -लेखिका : लेखक : श्री अभिजीत जोग ☆ परिचय –  श्री हर्षल सुरेश भानुशाली ☆

श्री हर्षल सुरेश भानुशाली

? पुस्तकावर बोलू काही ?

☆ “भारत – सत्य, सत्व, स्वत्व” -लेखिका : लेखक : श्री अभिजीत जोग ☆ परिचय –  श्री हर्षल सुरेश भानुशाली ☆

पुस्तक : भारत – सत्य, सत्व, स्वत्व

लेखक : अभिजित जोग

मूळ किंमत ₹४९९₹

भारत हा जगातील एकमेव देश असेल ज्याची खरी ओळख पुसून टाकण्यासाठी एक राष्ट्र म्हणून त्याचं अस्तित्वच नाकारण्यात आलं. शिक्षण आणि इतिहास या त्याच्या शक्तिस्थानांवर हल्ला करून त्याचा आत्मविश्वास आणि आत्मसन्मान नष्ट करण्यात आला. कधीच लयाला गेलेल्या आणि संग्रहालयापुरत्या उरलेल्या इतर प्राचीन संस्कृतीचं वारेमाप गुणवर्णन करण्यात साम्राज्यवादी शक्तींना कुठलीही अडचण वाटली नाही. पण हजारो वर्षांपासून आजही जिवंत असलेल्या भारतीय संस्कृतीचं महत्व मान्य करणं निरंकुशतावादी शक्तींसाठी गैरसोयीचं होतं. राजकीय स्वातंत्र्य मिळालं तरी या शक्तींनी लादलेल्या वसाहतवादी मानसिकतेतून भारतीयांची अजूनही पूर्णपणे मुक्तता झालेली नाही. न्यूनगंड, आत्मनिंदा यांचा प्रभाव अजूनही ओसरलेला नाही. कारण भारतीयांना आपली खरी ओळख अजूनही गवसलेली नाही.

‘सभ्यता’ या शब्दाचा अर्थ जगाला समजावणारा ; भाषा आणि संस्कृतीची देणगी जगाला देणारा ; विविध ज्ञानशाखांची पायाभरणी करणारा ; गळेकापू स्पर्धेशिवायही समृद्धीची निर्मिती करता येते हे दाखवून देणारा ; वैश्विक मानवी मूल्यांचा संदेश देणारा ; अराजक, अस्थैर्य, असहायता यांच्या गर्तेत सापडलेल्या जगाला स्थैर्य, शांती, समृद्धी, सर्वसमावेशकता यांचा मार्ग दाखविण्याची क्षमता असलेला देश, ही भारताची खरी ओळख भारतीयांनाच करून देणे अत्यावश्यक आहे.

वसाहतवादी मानसिकता झुगारून दिलेला, आपली खरी ओळख पटलेला, आपल्या सुप्त क्षमतांची जाणीव झालेला भारतच जगाला मार्ग दाखविण्याची आपली ऐतिहासिक जबाबदारी पार पाडण्यास सिद्ध होऊ शकेल.

या पुस्तकावरचे काही अभिप्राय ::

श्री. श्री. अभिजित जोग लिखित ‘भारत सत्य, सत्व, स्वत्व’ हा ग्रंथ म्हणजे हजारो वर्षांपूर्वी भारतीयांनी केलेल्या ज्ञानोपासनेचा व भारतीय संस्कृतीच्या विविध पैलूंचा धावता आढावाच होय. ‘ज्ञान विज्ञान योग’ असे प्रस्तुत ग्रंथाचे वर्णन करता येईल. यात तत्वज्ञान, अध्यात्म, भाषा (संस्कृत), वैद्यक, खगोलशास्त्र, गणित, धातुशास्त्र या ज्ञान-विज्ञानाच्या सर्व आयामांचा भारतातच उदय झाल्याचे सप्रमाण विवेचन केलेले आढळते. सखोल चिंतन, ‘ना मूलं लिख्यते किंचित’ हे असे धोरण, भारत म्हणजे जगातला पहिला ज्ञानाधिष्ठित समाजाचा देश, वेदोपनिषदे व सभ्यतेची मानवी मूल्ये भारतात निर्माण झाली तेंव्हा इतर देशात अज्ञानांधःकारच होता हे ठासून सांगणारा हा ग्रंथ होय.

— गो. बं. देगलूरकर

नामवंत विद्वान आणि भारतीय कला व स्थापत्यशास्त्राचे सर्वमान्य अभ्यासक

विषयाचा आवाका आणि मांडणी याबाबतीत हे पुस्तक ज्ञानकोषीय पातळीवर जाते. इतका मोठा विषय हाताळताना बारीक-सारीक तपशीलही सुटणार नाहीत याची काळजी घेण्यात लेखक अभिजित जोग पुन्हा एकदा यशस्वी ठरले आहेत.. तरीही, प्रवाही भाषेमुळे हे पुस्तक अत्यंत वाचनीय झाले आहे. भारतवर्षाची खरी ओळख पुनर्स्थापित करणारे हे दर्जेदार पुस्तक सर्व प्रकारच्या वाचकांना आवडेल असा मला विश्वास वाटतो.

— नीलेश ओक

विद्वान संशोधक आणि लेखक

सत्य दडपून जो तथाकथित ‘इतिहास’ पाश्चात्यांनी आपल्यावर लादला, त्याला आह्वान देण्याची ताकद अभिजित जोग यांच्या व्यक्तिमत्त्वात आणि लेखणीतही आहे, हे या पुस्तकामुळे पुन्हा एकदा निदर्शनास येतं. प्राचीन काळापासून भारताचं सत्त्व आणि स्वत्त्व हे ज्ञान आणि तत्त्वज्ञाना इतकंच विज्ञानातही आहे, ही अभिमानास्पद गोष्ट आपल्यापर्यंत पोचवण्यासाठी जोगांनी संशोधन वृत्तीनी लेखन केलं आहे. आपला हा वारसा पुढच्या पिढीपर्यंत पोचविण्यासाठी हे सत्यदर्शक पुस्तक जरूर वाचा.

— डॉ. सुचेता परांजपे

वेद आणि इंडोलॉजी तज्ञ

भारताच्या पुरातन अस्तित्वाला पोखरणाऱ्या डाव्या वाळवीची कृष्णकृत्ये साधार उघडकीला आणणारे, सव्यसाची लेखक अभिजित जोग यांचे अजून एक विलक्षण पुस्तक! सत्य मांडणारे, सत्व जपणारे आणि स्वत्वाची जाणीव देणारे. आपल्या आत्मवंचना ते आत्मघात या जीवघेण्या प्रवासाची गती थोपवणारा एक मोलाचा गतिरोधक आहे हे पुस्तक! अभिजित जोग यांच्या सहज शैली आणि ओघवत्या भाषेतला असा हा तब्बल अडीच सहस्त्रकांचा ठोस पुराव्यांसकट आलेख मांडणारा महत्वाचा दस्तावेज!

— दीपक करंजीकर

लेखक, अभिनेता, व्यवस्थापन आणि अर्थतज्ञ

परिचय : श्री हर्षल सुरेश भानुशाली

पालघर 

मो. 9619800030

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – ☆ पुस्तकांवर बोलू काही ☆ “भारतातील प्रमुख धर्म” –  लेखक : डॉ. शरद अभ्यंकर ☆ परिचय – श्री जगदीश काबरे ☆

श्री जगदीश काबरे

? पुस्तकावर बोलू काही ?

☆ “भारतातील प्रमुख धर्म” –  लेखक : डॉ. शरद अभ्यंकर ☆ परिचय – श्री जगदीश काबरे

पुस्तक : भारतातील प्रमुख धर्म 

लेखक: डॉ. शरद अभ्यंकर 

प्रकाशक: मनोविकास प्रकाशन (8888550837)

एकूण पृष्ठे : 200

किंमत : ₹ 270 

उत्क्रांतीच्या ओघात माकडापासून माणूस जन्माला आला. मग त्याला देवाधर्माची गरज केव्हापासून वाटायला लागली? या प्रश्नाचा विचार करता आपल्या असे लक्षात येते की, आदिमानव प्राणीसदृश्य होता. त्यामुळे फक्त आहार, मैथुन, निद्रा एवढ्याच गोष्टी त्याच्या आयुष्यात घडत होत्या. जसजसा तो उत्क्रांत होत गेला आणि त्याला चाकाचा, अग्नीचा, शेतीचा शोध लागला, त्यानंतर तो भटक्या अवस्थेतून एका जागेत स्थिरावण्याच्या अवस्थेत गेला. एका जागी स्थिरावल्यानंतर तो स्वसंरक्षणासाठी टोळ्या करून राहू लागला. त्याच काळात तो निसर्गाच्या अगम्य आणि अज्ञात गोष्टीविषयी विचार करू लागला. ज्या अर्थी आपल्याला या निसर्गातून अन्नपाणी मिळते आणि आपण जगू शकतो त्या अर्थी हे देणारा कोणीतरी नियंता असला पाहिजे, असे त्याकाळी त्याला वाटले. त्यातून देवाची निर्मिती झाली. पण त्या काळचे त्याचे देव निसर्गातील वरूण म्हणजे वारा, पर्जन्य म्हणजे पाऊस, सूर्य म्हणजे अग्नी, चंद्र म्हणजे शीतलता, इ. अशा नैसर्गिक वस्तू हेच होते. म्हणजे सुरुवातीला तो निसर्गपूजक होता. नंतर जसजशा टोळ्या मोठ्या होऊ लागल्या तसतसे त्यांच्यात कुणीतरी एक बलवान माणूस सरदार बनू लागला. नंतर असे संरक्षणकर्ते स्वतःला राजा म्हणू लागले.

काळ बदलत होता आणि इतिहास घडत होता. नंतरच्या पिढ्यांनी इतिहासातील अशा समाजाला दिशा देणाऱ्या राजांना त्यांच्या पराक्रमामुळे देव म्हणायला सुरुवात केली. मग माणूस निसर्गपूजक अवस्थेतून व्यक्तीपूजेकडे वळला. त्यातून समाज नितीनियमाने चालावा म्हणून त्यांचे पालन करण्यासाठी काही कर्मकांड आले. अशी कर्मकांडे जोपासणारा एक वर्ग समाजात निर्माण झाला. या वर्गाने समाजाला एका विशिष्ट विचाराने बांधून ठेवण्यासाठी धर्माची निर्मिती केली. काही धाडसी माणसे पृथ्वीवर वेगवेगळ्या ठिकाणी स्थलांतर करू लागली. त्यांनी या नव्या जगात आपला वेगळा धर्म स्थापन केला. अशा प्रकारे या पृथ्वीवर एकाचे अनेक धर्म निर्माण झाले. म्हणून आजही आपल्याला या सर्व धर्मात काही मूलतत्त्वे सारखीच दिसतात. भाषा जरी वेगळ्या असल्या तरी काही शब्दही अर्थासहित सारखेच असलेले दिसतात.

अशा सर्व धर्मांच्या तत्वांविषयी समग्रपणे सामान्य लोकांना कल्पना असतेच असे नाही. त्यामुळे प्रत्येकाला आपलाच धर्म श्रेष्ठ वाटतो आणि इतरांचा कनिष्ठ. खरे तर प्रत्येकाने आपापल्या धर्माचाही व्यवस्थित अभ्यास केलेला असतोच असे नाही. डॉ. शरद अभ्यंकर यांच्या मनात हा विचार आला. लोकांना सर्व धर्म व्यवस्थितपणे समजावेत, त्यातील खाचाखोचा, गुण आणि दोष लक्षात यावेत या उद्देशाने त्यांनी भारतातील प्रमुख धर्म (सच्चा भूमिकेतून घडवलेला धर्मपरिचय) या नावाचे एक पुस्तक लिहिले. यात धर्मांविषयी माहिती असली तरी ती त्यांनी अत्यंत सहजसोप्या आणि ओघवत्या भाषेत वर्णित केलेली आहे. त्यामुळे हे पुस्तक कुठेही जडजंबाल झालेले नाही. भारतातील प्रमुख धर्माविषयी माहिती देताना त्या धर्माचा उगम आणि उद्गाता कोण याची माहिती देतादेता त्या त्या धर्मात शिरलेल्या अंधश्रद्धा आणि धर्ममार्तंडांनी हितसंबंध जोपासण्यासाठी पोखलेला धर्म कसा टाकाऊ झालेला आहे, हेही विशद केलेले आहे. हे सांगताना त्यांनी खुसखुशीत भाषेतून बारीक-बारीक चिमटेही काढलेले आहेत. चिमट्यामुळे शरीराला होणारी वेदना जशी सुसह्य असते तसेच या पुस्तकातील धर्म चिकित्सेचे झाले आहे. हे म्हणजे असे झाले की, एखाद्याचे दोष सांगताना ‘तू मूर्ख आहेस’ असे सरळ न म्हणता ‘तुम्ही महाविद्वान आहात’, असे म्हणण्यासारखे आहे. पण लोकांना परखड सत्य झोंबते. त्यामुळे शालजोडीतूनच हाणले पाहिजे, हे लेखकाला चांगलेच कळले आहे, असे त्यांच्या लेखनातून जाणवते. अर्थात हे अत्यंत कठीण काम आहे. पण ते लेखकाने लिलया पेलले आहे. कसे ते आपण पुस्तकातील काही नमुन्यातून पाहूया…

1) मी सातारच्या वैद्यक महाविद्यालयात शिकवण्यासाठी जात असे. आमचे एक सह-प्राध्यापक ज्यू होते, ते भारत सोडून इस्रायलला जाणार होते, त्यांना कॉलेजतर्फे निरोप समारंभ झाला आणि इथले सर्व पाश सोडून आपल्या धर्मभूमीकडे जाणाऱ्या त्या डॉक्टरांचे सर्वांनी गुणगान केले. मला वाटले हाच एखादा मुस्लीम डॉक्टर पाकिस्तानात जात असता तर त्याला ‘खाना यहां का और गाना वहांका! ‘ अशा शिव्या खाव्या लागल्या असत्या. (पृष्ठ क्र. 22)

2) आक्रमक हिंदू धर्मीय यांची संख्याही आता राजाश्रयामुळे वाढत आहे. घरवापसी, गोमांस बाळगले अशा संशयावरून जीव घेणे, लव्ह जिहाद या नावाखाली प्रेमीजनांचा छळ करणे, ‘जय श्रीराम’ सक्तीने म्हणायला लावणे, दंगल केली असे आरोप ठेवून घरे बुलडोझ करणे हे आवडीने केले जाते. (पृष्ठ क्र. 69)

3) काही वर्षापूर्वी आम्ही जपानमध्ये प्रवास करत होतो. त्यावेळी बुद्ध पौर्णिमा होऊन काही दिवस झाले होते, आम्हाला टोकियो शहरात मोठ मोठी बुद्ध मंदिरे दाखवण्यात आली. आम्ही आमच्या गाईड महिलेला विचारले ‘तुमच्याकडे बुद्ध पौर्णिमेला काय कार्यक्रम झाले? ‘ यावर तिने विचारले ‘कसली बुद्ध पौर्णिमा? ‘ आम्ही ‘बुद्धाज बर्थ डे, फुल मून डे इन मे’ असे सांगितल्यावर ती म्हणाली ‘देवळातल्या पुजाऱ्यांनी काही कार्यक्रम केले असतील. इतरत्र आम्ही काही करत नाही. ‘ आमच्याकडे या दिवशी सुट्टी असते आणि बरेच सार्वजनिक कार्यक्रम होतात, असे सांगितल्यावर ती म्हणाली, ‘जपान मध्ये एकही धार्मिक सुट्टी नसते. ‘ यावर मी सांगितले की आमच्याकडे सात धर्मांच्या अनेक सुट्या असतात. त्यावर तिने ‘आता समजले तुमचा देश का मागासलेला आहे, ‘ अशा नजरेने आमच्याकडे पाहिले. (पृष्ठ क्र. 113)

4) एकंदरीत धर्म म्हटले की त्याचा प्रचार करण्यासाठी आणि रक्षण करण्यासाठी बराच अधर्म करावा लागतो, हेच खरे. (पृष्ठ क्र. 125)

5) असा हा ख्रिस्ती धर्म. सर्व जगभर पसरलेला. हजारो चांगल्या गोष्टी करणारा, पण शेकडो वाईट गोष्टींचा मोठा इतिहास असणारा. आपल्या सेवाकार्यातून हजारो लोकांचे जीव वाचवणारा पण तितक्याच लोकांचे जीव घेणाराही. एक सुविचार आहे, ‘माणसांना त्यांच्या लायकीनुसार सरकार मिळते, ‘ तसे आपल्याला म्हणता येईल, ‘लोकांना त्यांच्या लायकीनुसार धर्म मिळतो’. (पृष्ठ क्र. 136)

6) कुराणात कोणतीही भर घालणे, बदल करणे वा दुरुस्ती करणे यावर पूर्णपणे बंदी आहे. कारण याचा अर्थ कुराण अपूर्ण वा चुकीचे आहे असा होतो. आपला धर्मग्रंथ अपुरा आहे हे कोणताही धर्मनिष्ठ माणूस मान्य करत नाही. (पृष्ठ क्र. 146)

या उदाहरणांवरून आपल्या लक्षात येते की, त्यांनी सर्व धर्म आणि धर्मियांची चिकित्सा केलेली आहे. त्या पुस्तकाचे सार सांगताना प्रस्तावनेत श्री सुरेश द्वादशीवार लिहितात…

‘या पुस्तकात ज्यू आणि हिंदू या अतिशय प्राचीन धर्मापासून शीख व बहाई या अलीकडे जन्माला आलेल्या धर्मांचीही रोचक ओळख त्यांनी वाचकांना करून दिली आहे. ते करताना त्यांनी धर्मांच्या मूळ ग्रंथांची ओळख व त्यातील आचारांची महती तर सांगितलीच पण त्यांच्या अनुयायांनी प्रत्यक्ष व्यवहारात त्यांची केलेली मोडतोडही सांगितली आहे. सर्व धर्मांत काळानुरूप झालेले बदल, त्यातील प्राचीन नीतिमूल्यांची नंतरच्या काळात झालेली परवड आणि धर्मांनी निर्माण केलेल्या समाजव्यवस्था या साऱ्यांचे विवरण करतानाच अभ्यंकरांनी या धर्मांनी समाजातील दुबळ्या वर्गांवर व विशेषतः स्त्रियांवर कायमस्वरूपी लादलेल्या अन्यायाचे वर्णनही स्पष्टपणे सांगितले आहे. अतिशय मोजक्या शब्दांत पण कमालीच्या सच्च्या भूमिकेतून घडविलेला धर्मपरिचय व धर्मचिकित्सा असे या पुस्तकाचे वर्णन थोडक्यात करता येणारे आहे. ते करताना त्यांनी भारतातील बहुसंख्यकांच्या धर्मांएवढीच अल्पसंख्यकांच्या धर्मांचीही परखड चिकित्सा केली आहे हे त्याचे आणखीही एक वैशिष्ट्य आहे. ‘

एकंदरीत हे पुस्तक भारतातील प्रमुख धर्मांची नुसती माहिती देत नाही तर वाचकाने अंतर्मुख होऊन आपापल्या धर्माचा अभ्यास करून त्यात शिरलेल्या अनिष्ट रूढी, प्रथा, परंपरा नष्ट करण्यासाठी चिकित्सा करण्यास आणि इतर धर्मांचाही अभ्यास करण्यास उद्युक्त करते. हे पुस्तक लिहिताना त्यांनी कोणत्याही धर्माचा, धर्म संस्थापकाचा वा तो धर्म मानणाऱ्या लोकांचा अवमान केलेला नाही; तर सभ्य पण स्पष्ट शब्दात काही गोष्टी सुनावलेल्या आहेत. ज्याला भारतातील विविध धर्माविषयी जाणून घ्यायचे आहे अशा प्रत्येक वाचकाने म्हणूनच हे पुस्तक वाचायलाच हवे आणि माणुसकीने जगायला शिकायला हवे. तेव्हा लेखक पुस्तकाच्या शेवटी म्हणतात त्याप्रमाणे वाचकांनो, द्या सोडून हा कालबाह्य झालेला, वेळ, पैसा आणि श्रम यांचा अपव्यय घडवणारा, माणसा माणसात वैर निर्माण करणारा, झापडबंद विचार करायला लावणारा, सिंदबादच्या म्हाताऱ्यासारखा तुमच्या मानगुटीवर बसलेला धर्म नावाचा राक्षस आणि द्या मुक्त विचाराला वाव. विज्ञाननिष्ठा आणि मानवता यावर आधारित जीवनप्रणाली स्वीकारा. सुखी, समाधानी आणि आनंदी व्हा!

परिचय : श्री जगदीश काबरे

मो ९९२०१९७६८०

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares