ई-अभिव्यक्ती -संवाद ☆ २७ जुलै -संपादकीय – सौ. उज्ज्वला केळकर– ई – अभिव्यक्ती (मराठी)
शरद्चंद्र पुराणिक ( इ.स. १९३३९ – २७ जुलै २०१६ )
शरद्चंद्र पुराणिक यांनी संस्कृत विषयात बी.ए., एम. ए. केलं. पुढे इंग्रजी विषय घेऊनही एम. ए. केलं आणि महाविद्यालयात इंग्रजीचे प्राध्यापक म्हणून रुजू झाले. चिपळूण, खेड, अलिबाग इ. ठिकाणी नोकरी करून ते शेवटी चाळीसगावला स्थिरावले. त्यांचे इंग्रजी विषयावर प्रभुत्व होते. इंग्रजी नाटकातील संवाद व स्वागते ते तोंडपाठ म्हणून दाखवत. ते विद्यार्थीप्रिय प्राध्यापक होते.
शरद्चंद्र पुराणिक यांना वाचनाची आणि लेखनाचीही प्रचंड आवड होती. त्यांची १६ पुस्तके प्रकाशित झालीत. ८ पुस्तके लिहून तयार आहेत पण ती अद्याप प्रकाशित व्हायची आहेत.
शरद्चंद्र पुराणिक यांची पुस्तके –
इतिहास क्षेत्राशी निगडीत अशी त्यांची बरीच पुस्तके आहेत. उदा. १.पहिला बाजीराव- पूर्वार्ध, उत्तरार्ध, २.मराठ्यांचे स्वातंत्र्य समर- छत्रपती संभाजी, छत्रपती राजाराम , ३. ऋषितर्पण , ४.मराठी इतिहासाच्या अभ्यासकांचे व्यक्तिदर्शन- इ. ८च्या वर त्यांची पुस्तके आहेत. रियासतकार सरदेसाई, राजवाडे, विष्णुशास्त्री , श्री. म. माटे इ. व्यक्ती आणि त्यांचे कार्य सांगणारीही त्यांची पुस्तके आहेत.
पुरस्कार
त्यांच्या ‘रामदास’ या पुस्तकाला पुणे नगर वाचन मंदिरचा तर, ‘तुळाजी आंग्रे’ या पुस्तकाला मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालयाचा पुरस्कार मिळाला आहे. २०१० साली महाराष्ट साहित्य परिषदेच्या १०४ व्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने त्यांना ‘मृत्युंजय’ पुरस्कार देण्यात आला.
शरद्चंद्र पुराणिक यांचा आज स्मृतीदिन. त्यानिमित्ताने त्यांना विनम्र अभिवादन.
☆ ☆ ☆ ☆ ☆
सौ. उज्ज्वला केळकर
ई–अभिव्यक्ती संपादक मंडळ
मराठी विभाग
संदर्भ : साहित्य साधना – कराड शताब्दी दैनंदिनी, गुगल, विकिपीडिया
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
ई -अभिव्यक्ती -संवाद ☆ २२ जुलै – संपादकीय – सुश्री मंजुषा सुनीत मुळे– ई – अभिव्यक्ती (मराठी)
१. सुरेशचंद्र नाडकर्णी यांचा आज स्मृतीदिन. ( इ.स. १९२९ – २२ जुलै २०११ )
सुरेशचंद्र नाडकर्णीहे प्राणीशास्त्राचे प्राध्यापक होते. मराठी लेखक होते. गझलचे अभ्यासक होते आणि संगीततज्ज्ञही होते. तसेच ते आंतरराष्ट्रीय क्रीडासमीक्षकही होते. गझल आणि रुबाई या दोन्ही प्रकारचा त्यांचा मुळापासून अभ्यास होता. मराठी आणि उर्दू दोन्ही भाषेत त्यांनी वरील दोन्ही प्रकारात विपुल काव्यरचना केली आहे. उर्दू काव्यावर त्यांनी पीएच. डी. मिळवली होती. ‘उंबराचे फूल ‘ हा त्यांचा काव्यसंग्रह. तसेच ‘गजल’ हे ‘गजल ‘ काव्यप्रकाराला वाहिलेले पुस्तक त्यांनी लिहिले. सुरेश भट या आपल्या मित्राच्या आग्रहामुळे त्यांनी मराठीत गजला व रुबाया लिहिल्या.
वाडिया कॉलेजमधे ते प्राणीशास्त्र विभागाचे प्रमुख होते. त्यांनी अध्यापनाबरोबरच अनेक विषयांवर संशोधन व लेखन केले आहे. त्यांची अनेक पुस्तके अभ्यासक्रमात समाविष्ट झालेली आहेत. ‘साप्ताहिक स्वराज्य’मधे ते एके काळी हिन्दी गाण्यांचे रसग्रहण लिहीत असत। क्रीडासमीक्षाही त्यांनी लिहिल्या आहेत. ‘ क्रीडा ज्ञानकोश ’, ‘‘अॅथलॅटिक्समधील सुवर्ण पदकाच्या दिशेने ’ ही त्यांची पुस्तके त्यांच्या क्रीडाक्षेत्रातील नैपुण्याची साक्ष देतात.
सुरेशचंद्र नाडकर्णी यांची पुस्तके –
१. ‘उंबराचे फूल’ (कविता संग्रह),
२. गजल,
३. बहुरंग ( लेखसंग्रह ),
४. सदानंद – सुखी माणसाचा सदरा इ. त्यांची पुस्तके प्रसिद्ध आहेत.
याशिवाय विज्ञानाशी संबंधितही त्यांची पुस्तके आहेत.
श्री. नाडकर्णी यांना विनम्र आदरांजली.
☆☆☆☆☆
२. मराठी ग्रामीण कवी, बहुढंगी कथालेखक, चतुरस्त्र ग्रामीण कादंबरीकार म्हणून ज्यांचा लौकिकहोता, अशा श्री.गजानन लक्ष्मण ठोकळ यांचा आज स्मृतीदिन.( २६ मे १९०९ – २२ जुलै १९८४ ).
ग.ल. ठोकळ यांचा जन्म अहमदनगर जिल्ह्यातील कामरगाव इथे झाला. त्यांचे गाव कायम दुष्काळी व कोरडवाहू शेती असलेले होते. त्यांच्या ग्रामीण कथा – कादंबर्यातून प्रामुख्याने हे वर्णन दिसून येते. त्यातून ग्रामीण माणसे साधी – भोळी, सरळ मनाची, आपुलकी- आत्मीयता जपणारी, आतिथ्यशील अशी दाखवलेली आहेत, तर शहरी माणसे बेरकी असल्याचे दाखवलेले आहे, हे सर्वात आधी सांगावेसे वाटते.
त्यांच्या आईला वाचनाची आवड होती, आणि तिने आणलेली सगळी पुस्तके ते वाचून काढत असत. वयाच्या १६व्या वर्षी त्यांची ‘आकाशगंगा’ ही पहिली कविता प्रसिद्ध झाली. सुरुवातीला काही वर्षे त्यांनी शिक्षक म्हणून काम केले. आणि नंतर “ श्री लेखन वाचन भांडार “ हे दुकान सुरू केले, जे वाचकांचे आकर्षण ठरले होते . या जोडीनेच ‘ ४०० हून जास्त मौलिक ग्रंथांचे प्रकाशन करणारे प्रयोगशील प्रकाशक ‘ अशीही ख्याती त्यांनी मिळवली होती.
ते अव्वल दर्जाचे कथालेखक तर होतेच, पण स्वतःची वेगळीच शैली जोपासणारे उत्तम कवीही होते . तेव्हा प्रसिद्ध असणाऱ्या रविकिरण मंडळातील कवींचा त्यांच्यावर जरी प्रभाव होता, तरीही कवी म्हणून त्यांचे स्वतःचे असे एक वैशिष्ट्य होते , आणि ते म्हणजे त्यांच्या कवितेत ठळकपणे दिसणारे ग्रामीण जीवनाचे अस्सल, गहिरे रंग . पण जनमानसात आणि साहित्यविश्वातही “ कथाकार “ हीच त्यांची ठळक ओळख निर्माण झाली होती . कवयित्री शांता शेळके म्हणत की , “ ठोकळ यांनी निर्माण केलेले स्त्री-पुरूषांचे चित्रविचित्र जग हा वास्तव विश्वाचा एक छेद असतो .” वाचकाचे रंजन करतांना त्याला प्रत्यक्ष जीवनातील विविध अनुभवांचा प्रत्यय देणारा समर्थ कथाकार अशी श्री. ठोकळ यांची सार्थ ओळख निर्माण झाली होती .
ग.ल. ठोकळ यांची पुस्तके –
१. कोंदण, २. गावगंड, ३. मत्स्यकन्या, ४. मीठभाकर, ५. कडू साखर, ६. ठोकळ गोष्टी ( याचे अनेक भाग आहेत.) ७. टेंभा, ८. ठिणगी, ९. क्षितिजाच्या पलीकडे, १०. सुगी (निवडक ठोकळ कथा) यापैकी ‘ टेंभा ‘ ही त्यांची आत्मचरित्रवजा कादंबरी आहे .
“ गावगंड “ ही त्यांनी १९४२ च्या क्रांतिपर्वावर लिहिलेली कादंबरी इतकी गाजली की काही विद्यापीठांच्या अभ्यासक्रमात तिचा समावेश केला गेला होता.
त्यांच्या जानपदगीतांचा प्रातिनिधिक संग्रहसुद्धा खूप प्रसिद्ध होता, आणि त्याला श्री. वि. स. खांडेकर यांनी प्रस्तावना लिहिली होती.
ग.ल. ठोकळ यांच्यावर ‘ साहित्यश्रेष्ठ ग.ल. ठोकळ ‘ हे पुस्तक लिहिले गेले आहे. अनेक संस्था, साहित्यातील श्रेष्ठ कलाकृतींना ग.ल. ठोकळ यांच्या नावाचा पुरस्कार देतात.
आजच्या ‘ कवितेचा उत्सव ‘ सदरात वाचू या, सर्वांना शाळेच्या आठवणीत घेऊन जाणारी त्यांची एक ग्रामीण बाजाची कविता ..
श्री. ग. ल. ठोकळ यांना मनःपूर्वक श्रद्धांजली.
☆☆☆☆☆
३. मराठवाड्यातील साहित्यिक म्हणून नावाजलेले श्री यशवंत कानिटकर यांचाही आज स्मृतीदिन.(१२/१२/१९२१ – २२/७/२०१५)
लेखक आणि कवी म्हणून प्रसिद्ध असलेल्या श्री. कानिटकरांची आणखी एक विशेष ओळख होती ती ‘ भाषातज्ञ ‘ म्हणून . चार भाषांवर त्यांचे प्रभुत्व असल्याने स्वातंत्र्यपूर्व काळातल्या हैदराबाद राज्याच्या भाषा विभागात ‘ भाषांतरकार ‘ म्हणून काम करण्यास त्यांनी सुरुवात केली होती . १९५६ मध्ये झालेल्या ‘ राज्य – पुनर्रचनेनंतर त्यावेळच्या मुंबई राज्यात त्यांची बदली झाली. मुंबईतील सचिवालयात ‘ भाषा संचालक ‘ म्हणून ते रुजू झाले. या भूमिकेतून त्यांनी भाषाविषयक प्रश्नावर , राजभाषा, परिभाषा, अनुवाद, कोशरचना, आदि स्वरूपाचे विपुल लेखन केले. १ मे १९६० रोजी महाराष्ट्र राज्याची स्थापना झाल्यावर, सरकारी कारभाराची भाषा मराठी असेल असे सरकारने जाहीर केले. आणि त्यासाठी ‘ प्रशासनिक परिभाषा कोश ‘ व मार्गदर्शन पुस्तिका तयार करण्याचे काम श्री. कानिटकरांनी केले. भाषासंचालक या भूमिकेतून, राजभाषा मराठीविषयक धोरण राबवणे, परिभाषा कोश, अमराठी कर्मचाऱ्यांसाठी मराठी भाषेच्या परीक्षांचे आयोजन, केंद्राच्या राज्यासाठी असणाऱ्या अधिनियमांचा अनुवाद , अशी अनेक महत्वाची कामे त्यांनी केली.
पण या सगळ्या शासकीय कामात अतिशय व्यस्त असूनही त्यांचे मराठी साहित्यावरचे प्रेम मात्र तसूभरही कमी झाले नव्हते. साहित्य संस्कृती मंडळ पुरस्कृत मराठी शब्दकोशाचे मुख्य संपादक म्हणून ते काम करत होतेच, पण व्यक्त करण्यासारखे स्वतःचे खास असे खूप काही त्यांच्याजवळ असल्याचे त्यांना सतत जाणवत होते. काव्यकलेवर त्यांची हुकूमत होती, आणि काव्याच्या सामर्थ्याची उचित जाणही होती. त्यामुळेच ‘ मेनका ‘ हा त्यांचा कवितासंग्रह खूप प्रसिद्ध झाला होता. ज्येष्ठ समीक्षक सुधीर रसाळ यांच्या मते ‘ श्री. कानिटकरांच्या कवितांचे छंद, त्यांची भाषा, आकृतिबंध, आणि त्यांची प्रतिमासृष्टी, सगळेच वेगळे होते. त्यांच्या कवितेचे नाते मर्ढेकरांच्या कवितांशी जरी जोडता येत असले, तरी त्या परंपरेतील नवकाव्य त्यांनी हाताळलेले दिसत नाही.’ आयुष्यावरचे उत्कट प्रेम, अर्थपूर्ण जगणे, प्रेम, सृजनता, निसर्गसौंदर्याची अतिशय आवड, हे त्यांच्यातले कविता करण्यासाठी आवश्यक असणारे गुण, तेव्हाच्या हैदराबादमधल्या वातावरणात खूपच खुलले होते. पण मुंबईत आल्यावर माणसांचे तिथले जगणे पाहून, नंतरच्या त्यांच्या कवितांमधून नव्या जाणीव जागृत झाल्याचे स्पष्ट लक्षात येते. याचे उत्तम उदाहरण म्हणजे ही कविता —–
“ कडकलक्ष्मी “ या चित्रपटात ते अभिनेते म्हणूनही रसिकांना दिसले होते.
श्री. गोवाईकर रसिकांच्या कायम स्मरणात राहण्याचं आणखी एक मोठं कारण म्हणजे सातासमुद्रापलीकडेही गाजलेली त्यांची सुंदर कादंबरी “ मुंगी उडाली आकाशी “. ही कादंबरी श्राव्य माध्यमातूनही ते रसिकांसमोर सादर करायचे. म्हणजे हे “ एकपात्री अभिनव कादंबरी – वाचन “ त्यांनी स्वतः केलेले होते. निवेदन आणि विशेष म्हणजे त्याचे संगीत-संयोजनही त्यांनीच केलेले होते. या कादंबरी-वाचनाच्या कॅसेट्स प्रचंड लोकप्रिय झाल्या होत्या, आणि अजूनही आहेत. श्री संत ज्ञानेश्वर आणि त्यांची भावंडे यांच्या जीवनावर रेखाटलेली ओघवत्या भाषेतली ही कादंबरी म्हणजे अंतःकरणाला पीळ पाडणारी खरोखरच एक अनमोल कथा आहे.
श्री. गोवाईकर यांना त्यांच्या आजच्या स्मृतिदिनी विनम्र प्रणाम.
☆☆☆☆☆
सुश्री मंजुषा सुनीत मुळे
ई-अभिव्यक्ती संपादक मंडळ
मराठी विभाग
संदर्भ : विकिपीडिया.
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर ≈
ई-अभिव्यक्ती – संवाद ☆ २१ जुलै – संपादकीय – श्री सुहास रघुनाथ पंडित – ई – अभिव्यक्ती (मराठी)
राजा राजवाडे
साहित्याच्या विविध प्रांतात लिलया वावर करून सुमारे ऐंशी पुस्तकांची निर्मिती करणा-या राजा राजवाडे यांचा जन्म रत्नागिरी जिल्ह्यातील. देवरूख येथे मॅट्रीकपर्यंत शिक्षण पूर्ण करून ते मुंबईला आले. तेथे खालसा महाविद्यालयात अर्थशास्त्र व राज्यशास्त्र या विषयांत बी.ए. केले. मुंबई महानगरपालिकेत काही वर्षे नोकरी केल्यानंतर निवृत्त होईपर्यंत त्यांनी सिडको त नोकरी केली.
त्यांची साहित्यिक कारकिर्द ही विविधांगी आहे. 1962 साली ‘स्त्री’ या मासिकात त्यांची ‘उन्हातलं घर’ ही पहिली कथा प्रसिद्ध झाली. 1980 साली ‘सायाची पाने’ हा पहिला कवितासंग्रह प्रकाशित झाला. आपला नोकरीचा व्याप सांभाळून त्यानी कथा, कादंबरी, ललित, विनोदी कथा व कादंबरी, व्यक्तिचात्रण, चित्रपट कथा लेखन असे विपुल लेखन केले आहे. याशिवाय सलग 35 वर्षे ते विविध नियतकालिकांमधून व मासिकांतून लेखन करत होते. दैनिक ‘तरूण भारत’ मध्ये त्यांनी संपूर्ण वर्षभर ‘उतरती उन्हे’ हे सदर चालवले होते.ललित मधील ‘उदंड झाली अक्षरे’, सोबत मधील ‘सप्तरंग’, मार्मिक, धर्मभास्कर, नवशक्ती, रत्नागिरी टाईम्स, अशा दैनिक व मासिकातून त्यांनी स्तंभलेखन केले आहे. ‘मराठी बाणा’ या दिवाळी अंकाचे संपादन करून मराठी भाषेवरील प्रेम सिद्ध करून टिकाकारांना उत्तर दिले होते. साहित्य, भाषा, याविषयी त्यांनी आपली मते परखडपणे मांडली. कोकण म. सा. परिषदेच्या माध्यमातून त्यांनी मराठी भाषा, साहित्य यासंबंधी अनेक उपक्रम यशस्वी केले. परिषदेच्या ‘झपूर्झा’ या त्रैमासिकाचे संपादनही केले.
स्वाभिमान व परखडपणा बरोबरच मित्रांबद्द्ल अपार स्नेह व हळवेपणा हे त्यांच्या स्वभावाचे वैशिष्ट्य होते. ‘दोस्ताना’ या त्यांच्या व्यक्तिचित्रण संग्रहात ते दिसून येते. अनेक नामवंत साहित्यिकांशी त्यांचा दोस्ताना होता.
30 कादंब-या, 14 विनोदी कादंब-या, 9 कथासंग्रह, 9 विनोदीकथासंग्रह, 4 कवितासंग्रह, 3 ललितलेख संग्रह, 1 व्यक्तिचित्रण संग्रह व 3 चित्रपट कथा लिहून त्यांनी मराठी साहित्यात मोलाची भर घातली आहे. सर्व पुस्तकांची सविस्तर नावे देणे, शब्दमर्यादेमुळे शक्य नसले तरी ‘धुमसणारं शहर’, ‘कार्यकर्ता’, ‘अस्पृश्य सूर्य’, ‘दुबई-दुबई’ यासारख्या गाजलेल्या पुस्तकांचा उल्लेख करावाच लागेल.
एकवीस जुलै 1997 ला एका अपघातात त्यांचे निधन झाले.त्यांची जीवन यात्रा संपली पण साहित्य क्षेत्रातील त्यांचा प्रदीर्घ प्रवास अनमोल ठेवा मागे सोडून गेला आहे.
त्यांच्या चतुरस्त्र लेखणीस सलाम!
☆☆☆☆☆
श्री सुहास रघुनाथ पंडित
ई-अभिव्यक्ती संपादक मंडळ
मराठी विभाग
संदर्भ : विकिपीडिया, मराठीसृष्टी.
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
ई -अभिव्यक्ती -संवाद ☆ २० जुलै – संपादकीय – सौ. गौरी गाडेकर -ई – अभिव्यक्ती (मराठी)
वा. म. जोशी.
वामन मल्हार जोशी (21 जानेवारी 1882 – 20 जुलै 1943) हे लेखक, पत्रकार होते.
एम. ए.झाल्यावर ते ‘राष्ट्रीय’ शाळेत शिक्षक म्हणून रुजू झाले.
नंतर जोशींनी ‘विश्ववृत्त’ नावाचे ‘राष्ट्रीय’ मासिक काढले. त्यातील ब्रिटिश कार्यकर्त्यांच्या विरुद्ध असलेल्या मजकुरामुळे त्यांना तीन वर्षांची सक्तमजुरीची शिक्षा ठोठावली गेली.
तुरुंगातून सुटल्यावर जोशी दोन वर्षे दैनिक केसरीचे संपादक होते.
पुढे ते महर्षी कर्वेंनी स्थापन केलेल्या महिला महाविद्यालयात तत्त्वज्ञान, मानसशास्त्र व इंग्रजी-मराठी साहित्याचे प्राध्यापक झाले.
कालांतराने जोशी पुण्याच्या एस.एन.डी.टी.महाविद्याल याचे प्राचार्य म्हणून निवृत्त झाले.
वा. म. जोशींनी, ‘आश्रमहरिणी’, ‘इंदू काळे व सरला भोळे’, ‘नीति-शास्त्र-प्रवेश’, ‘विचार सौंदर्य’, ‘सुशिलेचा देव’ इत्यादी अनेक पुस्तके लिहिली.
वा. म. जोशी यांच्यावर ‘वा. म. जोशी -चरित्र आणि वाङ्मय’, ‘वा. म. जोशी साहित्यदर्शन’, ‘वामन मल्हार आणि विचार सौंदर्य’ इत्यादी पाच पुस्तके लिहिली गेली आहेत.
1930च्या मडगाव, गोवा इथे भरलेल्या साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद वा. म. जोशींनी भूषवले होते.
☆☆☆☆☆
डॉ. रघुनाथ विनायक हेरवाडकर
डॉ.रघुनाथ विनायक हेरवाडकर (25सप्टेंबर 1915 – 20 जुलै 1994) हे इतिहासविषयक लेखन व बखरींचे संशोधन करीत.
त्यांचे शिक्षण एम.ए., पीएच.डी. असे झाले होते.
ते विद्यार्थीप्रिय प्राध्यापक होते.
ते बखर वाङ्मयाने मोहित झाले. व त्यात त्यांनी स्वतःला झोकून दिले.
त्यांना 140 बखरी उपलब्ध झाल्या. त्यापैकी 78 बखरी ऐतिहासिक होत्या. त्या मोडी लिपीत होत्या. शिवाय त्यांत असणाऱ्या अरबी, फारसी, उर्दू शब्दांच्या अनेक अर्थांतून बखरकाराला अभिप्रेत असलेला नेमका अर्थ शोधून काढणे, हे खूप गुंतागुंतीचे असे.पण हे सर्व त्यांनी केले. एखाद्या मुद्यावर सर्वंकष आधार शोधून, समतोल मनाने त्याचा विचार करून ते संपादन करत. त्यांचे लेखन व संपादन शैली अतिशय पद्धतशीर होती.
त्यांनी ‘पानिपतची बखर’, ‘सप्तप्रकरणात्मक चरित्र’, ‘श्रीमंत छत्रपती संभाजी महाराज व थोरले राजाराम महाराज यांची चरित्रे ‘ इत्यादी बखरींचे संपादन करून त्यांनी त्या पुनःप्रकाशित केल्या. याच विषयावर प्रबंध लिहून त्यांनी पीएच.डी. मिळवली.
याव्यतिरिक्त त्यांनी ‘भाऊसाहेबांची बखर’, ‘मराठी बखर’, ‘ श्रीमंत भाऊसाहेबांची कैफियत’, ‘थोरले शाहू महाराज’ इत्यादी अनेक पुस्तके लिहिली /संपादित केली.
वा. म. जोशी व डॉ. रघुनाथ हेरवाडकर यांना त्यांच्या स्मृतिदिनानिमित्त आदरांजली.
☆☆☆☆☆
सौ. गौरी गाडेकर
ई–अभिव्यक्ती संपादक मंडळ
मराठी विभाग
संदर्भ :साहित्य साधना, कऱ्हाड शताब्दी दैनंदिनी, विकीपीडिया, पोएम कट्टा.
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर ≈
ई-अभिव्यक्ती -संवाद ☆ १९ जुलै -संपादकीय – श्रीमती उज्ज्वला केळकर– ई – अभिव्यक्ती (मराठी)
धोंडो विठ्ठल देशपांडे
धोंडो विठ्ठल देशपांडे हे एक नामवंत शिक्षक, फर्डे वक्ते आणि थोर समीक्षक होते. मराठी आणि इंग्रजी या भाषांवर त्यांचे उत्तम प्रभुत्व होते. जगातील अभिजात साहित्याचा आणि संहिताशास्त्राचा त्यांचा गाढ व्यासंग होता. मर्ढेकरांच्या कविता आणि जी. ए. कुलकर्णीच्या कथा यांचे विवेचन त्यांनी आपल्या ग्रंथातून केले. अश्मसार या नावाने मराठी समीक्षेत त्यांनी केलेल्या लेखणामुळे मोलाची भर पडली आहे. धो. वि, देशपांडे हे शिक्षक मतदार संघातून दोन वेळा विधान परिषदेवर निवडून गेले होते.
बुद्धिमता, तर्कसंगत युक्तिवाद आणि डौलदार वक्तृत्व यामुळे त्यांची भाषणे प्रभावी होत. शिक्षकांचे प्रश्न त्यांनी पोटतिडकीने मांडले आणि शिक्षणाचा दर्जा उंचवला पाहिजे असा सतत आग्रह धरला, देशपांडे हे कोणत्याही पक्षाच्या चौकटीत बसले नाहीत. साहित्य क्षेत्रात, शिक्षण क्षेत्रात आणि सार्वजनिक जीवनात ते व्यक्तिवादी होते.
आज त्यांचा स्मृतीदि. त्यानिमित्त त्यांना सादर अभिवादन.
☆ ☆ ☆ ☆ ☆
श्रीमती उज्ज्वला केळकर
ई–अभिव्यक्ती संपादक मंडळ
मराठी विभाग
संदर्भ : साहित्य साधना – कराड शताब्दी दैनंदिनी, साप्ताहिक साधना टीम
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
ई -अभिव्यक्ती -संवाद ☆ १८ जुलै – संपादकीय – सुश्री मंजुषा सुनीत मुळे– ई – अभिव्यक्ती (मराठी)
उपेक्षितांच्या अंतरंगाचा वेध घेणारे, आणि परिवर्तनाला फक्त चालनाच नाही तर दिशाही देणारे साहित्यिक , लोककवी , आणि समाजसुधारक म्हणून सुपरिचित असणारे श्री. तुकाराम भाऊराव उर्फ अण्णा भाऊ साठे यांचा आज स्मृतिदिन . ( १/८/१९२० – १८/७/१९६९ ) .
सुरुवातीला मार्क्सवादी आणि नंतर आंबेडकरवादी विचारसरणी अवलंबणारे श्री. अण्णा साठे यांच्या साहित्याचे योगदान महाराष्ट्राच्या एकूणच जडणघडणीत आणि सामाजिक परिवर्तनात महत्वाचे ठरलेले आहे. संयुक्त महाराष्ट्राची चळवळ जनमानसात रुजवण्याचे आणि त्या चळवळीसाठी लोकांना प्रेरित करण्याचे महत्वाचे काम करण्यात अण्णांचा मोलाचा आणि मोठा वाटा होता. मुख्यतः याच हेतूने त्यावेळी त्यांच्या ‘ लालबावटा कलापथकाचे ‘ कार्यक्रम तेव्हाच्या मुंबई प्रांतातल्या जवळपास सर्वच भागांमध्ये हजारो ठिकाणी त्यांनी सादर केले होते.
त्यांच्या लिखाणावरून ते उपजतच बुद्धिवान होते आणि बुद्धिवादीही होते असे नक्कीच म्हणायला हवे. त्यामुळे, केवळ आपल्या अतिशय प्रभावी लेखनाच्या माध्यमातून जनजागृतीचे एवढे काम करणारे अण्णा, स्वतः प्रत्यक्षात फक्त दीडच दिवस शाळेत गेले होते, यावर सहज विश्वास बसणार नाही. त्यांच्या याच पथकाच्या माध्यमातून त्यांनी तेव्हाच्या अनेक सरकारी निर्णयांना परिणामकारकपणे आव्हान दिले होते.
पुढे श्री.आंबेडकरांच्या शिकवणुकीला अनुसरून ते दलितांसाठी कार्यरत झाले , आणि दलितांच्या जीवनातले अनुभव आपल्या कथांमधून प्रभावी भाषेत व्यक्त करू लागले—आणि तिथेच ’ पहिला दलित लेखक’ अशी त्यांची ओळख निर्माण झाली. १९५८ साली मुंबईत झालेल्या पहिल्या दलित संमेलनात आपल्या उदघाटनाच्या भाषणातून त्यांनी दलित आणि कामगारवर्गाचे जागतिक स्तरावर असलेले महत्व ठासून अधोरेखित केले.
प्रतिभेचं लेणं लाभलेल्या अण्णांचे बहुतेक सर्व लेखन गंभीर स्वरूपाचे, पोटतिडिकीने लिहिल्याचे आवर्जून जाणवते. त्यांच्या एकूण ३५ कादंबऱ्या, आणि १५ लघुकथा संग्रह प्रकाशित झाले. आणि या संग्रहातल्या बऱ्याच लघुकथांचे इतर अनेक भारतीय भाषांमध्ये आणि २७ अभारतीय भाषांमध्ये अनुवाद केले गेले आहेत. याव्यतिरिक्त ३ नाटके, १२ पटकथा , पोवाडा शैलीतील १० गाणी, आणि ‘ कविता आणि माझा रशियाचा प्रवास ‘ हे प्रवासवर्णनही अण्णांनी लिहिलेले आहे. लेखन मर्यादेमुळे त्यांच्या मोजक्याच साहित्याचा उल्लेख इथे करावा लागतो आहे याचा खेद वाटतो.
१. लोकनाट्य — अकलेची गोष्ट , कापऱ्या चोर , देशभक्त घोटाळे , पुढारी मिळाला , लोकमंत्र्यांचा दौरा ,
शेटजींचे इलेक्शन , मूक मिरवणूक , इत्यादी .
२. कथासंग्रह —कृष्णाकाठच्या कथा , गजाआड , जिवंत काडतूस , निखारा , पिसाळलेला माणूस , फरारी , इ.
त्यांच्या “ फकिरा “ या कादंबरीला सन १९६१ मध्ये राज्य सरकारचा उत्कृष्ट कादंबरीसाठीचा पुरस्कार मिळाला होता. त्यांच्या लोककथात्मक शैलीमुळे त्यांचे पोवाडे आणि लावण्या लक्षणीय प्रभावकारक ठरल्या होत्या. त्यांच्या कादंबऱ्यांवर आधारित असणारे – वैजयंता , टिळा लावते मी रक्ताचा , डोंगरची मैना , वारणेचा वाघ , फकिरा , अशासारखे चित्रपटही खूप गाजले .
त्यांच्या व्यक्तित्वावर, कर्तृत्वावर आणि साहित्यावर आधारित असणारी जवळपास १२ पुस्तके वेगवेगळ्या लेखकांनी लिहिलेली आहेत .
त्यांच्या नावाने “ साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे विकास महामंडळ “ स्थापन केले गेले आहे . तसेच त्यांच्या नावाने साहित्य संमेलनही भरवले जाते.
असे बहुरंगी व्यक्तिमत्व लाभलेले, आणि कायम जनजागृतीला वाहून घेतलेलेसमृद्ध साहित्यिक श्री. अण्णा भाऊ साठे यांना त्यांच्या आजच्या स्मृतिदिनी विनम्र अभिवादन.
☆☆☆☆☆
सुश्री मंजुषा सुनीत मुळे
ई-अभिव्यक्ती संपादक मंडळ
मराठी विभाग
संदर्भ : विकिपीडिया.
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर ≈
ई -अभिव्यक्ती -संवाद ☆ १६ जुलै – संपादकीय – सौ. गौरी गाडेकर -ई – अभिव्यक्ती (मराठी)
वासू बेंद्रे
वासुदेव सीताराम बेंद्रे (13 फेब्रुवारी 1894 – 16 जुलै 1986) हे थोर इतिहाससंशोधक होते.
त्याकाळी 16 वर्षांचे झाल्याशिवाय मॅट्रिकची परीक्षा देता येत नसे. बेंद्रेंचा अभ्यास तर 14 व्या वर्षीच पूर्ण झाला होता. ती दोन वर्षे त्यांनी रेल्वे ऑडिटमध्ये विनावेतन काम केले. तीन महिन्यांतच ते शॉर्टहँड व स्टेनोग्राफीत प्रवीण झाले. त्याबद्दल त्यांना सुवर्णपदक मिळाले. त्यांची कामाची तडफ, निष्ठा,निर्णयक्षमता बघून त्यांच्या वरिष्ठानी त्यांना दुसऱ्या लेव्हलचे गॅझेटेड ऑफिसर होण्याचा सल्ला दिला. एज्युकेशन डायरेक्टर जे. जी. कॉन्व्हर्टन यांनी त्यांची क्षमता बघून त्यांना मराठ्यांच्या इतिहासाचं संशोधन करण्यासाठी प्रवृत्त केलं.
त्यांनी पुण्याच्या इतिहास संशोधक मंडळ येथे संशोधन करून लिहिलेला ‘साधन-चिकित्सा’ हा त्यांचा पहिला ग्रंथ होता. हा ग्रंथ तेव्हाच्या इतिहासाकारांनी तर वाखाणलाच, शिवाय त्या क्षेत्रात संशोधन करणाऱ्यांनाही तो मार्गदर्शक ठरला.
बेंद्रे शिष्यवृत्ती मिळवून इंग्लंड व युरोपला गेले. तेथे त्यांनी अनेक ऐतिहासिक दस्तावेजांचा कसून अभ्यास केला. पुरावा असल्याशिवाय ते कोणतीही गोष्ट खरी मानत नसत. त्यापूर्वी शिवाजी महाराजांचं म्हटलं जाणारं चित्र हे दुसऱ्याच व्यक्तीचं होतं.संभाजी महाराजांवर संशोधन करत असताना बेंद्रेनी प्रयत्नपूर्वक शिवाजी महाराजांचं चित्र शोधून काढून ते लोकांसमोर आणलं. तेच चित्र आपल्याला खरे शिवाजी महाराज कसे दिसत, ते दाखवतं.
बेंद्रेनी शिवाजी महाराजांवर दोन खंड लिहिले.
इंग्लंडमधील दस्तावेजांचा अभ्यास करून बेंद्रेनी संभाजी महाराजांचे चरित्र लिहिले. त्यामुळे तोपर्यंत संभाजी महाराजांची असणारी मलीन प्रतिमा खोटी ठरून लोकांसमोर त्यांची उमदे, शूर, विद्वान,प्रतिभाशाली साहित्यिक ही ओळख निर्माण झाली.
बेंद्रेनी संभाजी महाराजांची समाधी शोधून काढून तिचा जीर्णोद्धारही केला.
पेशवे दफ्तराचे डायरेक्टर ऑफ रिसर्च या पदावर काम करताना त्यांनी मोडीत लिहिलेली 4कोटी ऐतिहासिक कागदपत्रे तपासून त्यांची विषयवार व कालानुक्रमे सूची बनवली. सूची बनवण्याच्या पद्धतीवर त्यांनी पुस्तकेही लिहिली. ती अजूनही वापरली जातात.
यानंतर त्यांनी तंजावर दफ्तराचीही सूची तयार केली.
बेंद्रे मुंबई इतिहास मंडळाचे डायरेक्टर व महाराष्ट्र ऐतिहासिक परिषदेचे सी.ई.ओ.होते. या काळात त्यांनी 3 परिषदा भरवल्या,19 त्रेमासिक जर्नलं व 14पुस्तकांचे प्रकाशन केले.
बेंद्रेनी ऐतिहासिक संशोधन व लेखन कसं करावं याविषयी प्राध्यापकांना प्रशिक्षण दिलं.
बेंद्रेनी अनेक विद्यापीठात मराठ्यांच्या इतिहासावर परिषदा घेतल्या.
इंडियन हिस्टॉरिकल रेकॉर्ड्स कमिशन व ऑल इंडिया हिस्टरी काँग्रेसचे ते सल्लागार होते.
इतिहासात हुंडापद्धत अस्तित्वात नव्हती, हे लोकांना पटवून हुंडाविरोधी चळवळीत त्यांनी सक्रिय योगदान दिले. ब्रदरहूड स्काऊट चळवळ व विद्यार्थी संघटनेतही त्यांचा सहभाग होता.
त्यांनी मराठी व इंग्रजीत 60हून अधिक पुस्तके लिहिली. त्यापैकी संत तुकारामांवर 8-9 पुस्तके होती.
मालोजी- शहाजी, संभाजी, शिवाजी, राजाराम यांच्या चरित्रांसाठी त्यांना पुरस्कार मिळाले.
☆☆☆☆☆
नीला सत्यनारायण
नीला सत्यनारायण (5 फेब्रुवारी 1948 – 16 जुलै 2020)या लेखिका व मुलकी अधिकारी होत्या. त्या महाराष्ट्रातील पहिल्या स्त्री निवडणूक आयुक्त होत्या.
त्या पूर्वाश्रमीच्या नीला वासुदेव मांडके.
त्यांनी महाराष्ट्र राज्याच्या गृहखाते, वनविभाग, समाजकल्याण अशा वेगवेगळ्या खात्यांत काम केले. त्या डायरेक्टर जनरल ऑफ इन्फॉरमेशन अँड पब्लिक रिलेशन्स होत्या.1995-99 या काळात त्या प्रिन्सिपल सेक्रेटरी होत्या.
ऍडिशनल चीफ सेक्रेटरी (रेव्हिन्यू) या पदावरून त्या निवृत्त झाल्या.
निवृत्तीनंतर त्यांची नियुक्ती राज्य निवडणूक आयुक्त या पदावर झाली.
निवृत्तीनंतर त्या एम. आय. टी. सिव्हिल सर्व्हिसेस ट्रेनिंग इन्स्टिट्यूटमध्ये शासकीय व्यवस्थेवर व्याख्याने देत असत.
त्यांनी मुख्यत्वे मराठीत लिहिले. त्यात 7 कादंबऱ्या, 10 कवितासंग्रह व 2 आत्मचरित्रात्मक पुस्तके वगैरेंचा समावेश होतो.
‘एक पूर्ण अपूर्ण’ यात आपलं करिअर सांभाळून त्यांनी आपल्या डाउन सिंड्रोम असलेल्या मुलाला कसे वाढवले, याचं अनुभवकथन आहे.
‘जाळरेषा’त त्यांच्या करिअरमधील चार दशकांतील अनुभव वाचायला मिळतात. याच्या विक्रीतून मिळालेले उत्पन्न त्यांनी नाना पाटेकरांच्या, शेतकऱ्यांना मदत करणाऱ्या एन.जी.ओ.ला दिले.
याव्यतिरिक्त त्यांनी ‘पुनर्भेट’, ‘सत्यकथा’, ‘एक दिवस जीवनातला’, ‘पालकांच्या मार्गदर्शनासाठी केसस्टडी’ वगैरे अनेक पुस्तके लिहिली.
नियतकालिकांत प्रकाशित झालेल्या त्यांच्या लेखांचे ‘आयुष्य जगताना’ व ‘डेल्टा 15’ हे संग्रह प्रसिद्ध झाले आहेत.
त्यांनी अनुवादही केला आहे.
त्यांच्या आयुष्यावर आधारित ‘बाबांची शाळा’ या चित्रपटाचे संगीत दिग्दर्शन त्यांनीच केले होते.
16 जुलै 2020ला करोनामुळे त्यांचे निधन झाले .
आज वासू बेंद्रे व नीला सत्यनारायण यांचा स्मृतिदिन आहे. त्यानिमित्त त्यांना सादर अभिवादन.
☆☆☆☆☆
सौ. गौरी गाडेकर
ई–अभिव्यक्ती संपादक मंडळ
मराठी विभाग
संदर्भ :साहित्य साधना, कऱ्हाड शताब्दी दैनंदिनी, विकीपीडिया
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर ≈
ई-अभिव्यक्ती -संवाद ☆ १५ जुलै -संपादकीय – श्रीमती उज्ज्वला केळकर– ई – अभिव्यक्ती (मराठी)
गजानन विश्वनाथ केतकर ( १० ऑगस्ट १८९८ – १५ जुलै १९८०)
ग.वि. केतकर हे सावरकरवादी, विज्ञाननिष्ठ मराठी पत्रकार होते. लो. टिळकांचे हे नातजावई. लो. टिळकांची मुलगी त्यांची आई.त्यांचे बालपण आणि तरुणपणीची काही वर्षे टिळकांच्या देखरेखीखाली गेली. कायद्याची परीक्षा देऊन ते केसरीत दाखल झाले. १९४७ ते १९५० ते केसरीचे संपादक होते. पुढे त्यांनी पराधर्मीय मुलीशी प्रेमविवाह केला. त्यामुळे त्यांना ‘केसरी’ सोडावा लागला.
२० जानेवारी १९५७ पासून तरुण भारत पुणे आवृत्तीचे ते संपादक झाले. १९६४ पर्यन्त ते तरुण भारतचे संपादक होते.
केतकरांनी अनेक वृत्तपत्रातून भगवद्गीतेविषयक लेखन करून गीताधर्म मंडळाच्या स्वीकृत कार्याचा उदंड प्रचार केला. मार्गशीर्ष शुद्ध एकादशी हा दिवस गीताजयंती म्हणून साजरा व्हावा, यासाठी त्यांनी खूप प्रयत्न केले. आता हे सर्वमान्य झाले आहे.
ग.वि. केतकरांचे लेखन –
१. ख्रिस्ती ड्रामा, २. गीताबीज, ३. गीतार्थ चर्चा , ४. मर्मभेद , ५. रणझुंजार (डॉ. खानखोजे यांचे चरित्र), ६. लोकमान्यांची भाषाशैली, ७.हिंदुत्वाची राष्ट्रीय मीमांसा ,
विश्वकोशासाठी लेखन – जैन, ज्यू, चीन व जपान येथील अंत्यविधी व अंत्यसंस्कार
ग.वि. केतकरांविषयीची पुस्तके
१. पत्रकार महर्षी ग.वि. केतकर- संपादन, संकलन – अरविंद केतकर
२. . पत्रकार महर्षी ग.वि. केतकर- वीणा हरदास
☆ ☆ ☆ ☆ ☆
जयवंत दत्तात्रेय जोगळेकर – (७ऑक्टोबर१९२१ – १५ जुलै २०१६ )
ज.द. जोगळेकर हिंदुत्वाचे खंदे पुरस्कर्ते व भाष्यकार होते. ‘एका हिंदुत्वनिष्ठाची आत्मकथा हे त्यांचे पुस्तक वयाच्या ९२व्या वर्षी प्रकाशित झाले.
ज.द. जोगळेकर सावरकप्रेमी पत्रकार होते. ते कायद्याचे पदवीधर होते. ते मूळचे बडोद्याचे पण पुढे त्यांनी मुंबई आपलीशी केली.
द बॉंम्बे क्रॉंनिकल या वृत्तपत्राचे उपसंपादक होते.
ज. द. जोगळेकर यांची काही प्रकाशित पुस्तके –
१.अफगाणिस्तानात तालिबानचा पराभव, २. अमेरिकन क्रांती, ३. इंग्रजी दृष्टीकोणातून १८५७ चा प्रस्फोट, ४ . चिनी राज्यक्रांती, ५. जगाटेल इस्लामी समाजाची हालचाल, ६. दोन युद्धे, ७. निधर्मी राष्ट्रवादाचे शिल्पकार, ८. भारतातील युद्धशास्त्राची उपेक्षा, ९. रशियन राज्यक्रांती, १०. समीक्षा संचित (निवडक ६३ ग्रंथ परीक्षणांचा संग्रह) इये. अनेक पुस्तके त्यांनी लिहिली. त्यांची बहुतेक पुस्तके राजकारण क्षेत्राशी संबंधित आहेत.
त्यांना सावरकर राष्ट्रीय स्मारक समितीने पुरस्कार दिला होता.
☆ ☆ ☆ ☆ ☆
प्रकाश नारायण संत (१६ जून १९३७ – १५ जुलै २००३ )
प्रकाश संत हे मराठीतील नामांकित कथाकार. त्यांनी ‘लंपन या लहान मुलाला केंद्रस्थानी ठेवून लिहीलेल्या अर्ध आत्मचरित्रात्मक कथा मराठी कथाविश्वात विशेष गाजल्या. सुप्रसिद्धा ललित लेखक नारायण संत आणि सुप्रसिद्ध कवयत्री इंदिरा संत यांचे ते चिरंजीव. त्यांच्या बहुतेक सगळ्या पुस्तकांना पुरस्कार मिळाले आहेत.
भूरचनाशास्त्रात त्यांनी एम.एस. सी., पीएच.डी. केली. नंतर कर्हाड येथे ‘यशवंतराव चव्हाण कॉलेज ऑफ सायन्समध्ये १९६१ साली सहयोगी प्राध्यापक म्हणून रुजू झाले. तिथून ते ९७ साली निवृत्त झाले.१५ जुलै २००३ला त्यांचं अपघाती निधन झाले.
१७व्या वर्षापासून त्यांनी ललित लेखनास सुरुवात केली. २० व्या वर्षापासून ते कथा लिहू आगळे. ‘सत्यकथे’सारख्या दर्जेदार मासिकातून त्यांचे लेखन प्रसिद्ध झाले. त्यांच्या निधनानंतर त्यांचा ‘झुंबर’ हा कथासंग्रह प्रकाशित झाला. ते उत्तम चित्रकारही होते. पाहिया ३ पुस्तकांसाठी त्यांनी त्यांनी स्वत: रेखाटने केली आहेत.
प्रकाश संत यांचे प्रकाशित साहित्य व पुरस्कार –
१. चांदण्याचा रास्ता ( ललित लेख )
२. झुंबर (कथा)
३. पंखा ( कथा) इचलकरंजी संमेलन स्मृती ट्रस्ट पुरस्कार
४. वनवास – श्री. दा. पानवलकर पुरस्कार, महाराष्ट्र राज्य पुरस्कार, ग्रंथोत्तेजक पुरस्कार- इचलकरंजी, महाराष्ट्र फाउंडेशन –मुंबई
५. शारदा संगीत – महाराष्ट्र राज्य पुरस्कार
६. शारदा संगीत या कथेस नवी दिल्ली येथील कथा पुरस्कार तर आडाम या कथेस शांताराम पुरस्कार
७. सुप्रिया दीक्षित या प्रकाश संत यांच्या पत्नी. ‘अमलताश’ या पुस्तकात त्यांनी पतीच्या सहवासातील ६० वर्षांच्या काळाचा लेखा-जोखा मांडलेला आहे. या पुस्तकाला महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृतिक मंडळाचा आत्मचरित्रासाठी दिला जाणारा ‘लक्ष्मीबाई टिळक पुरस्कार २०१४ साली मिळाला.
☆ ☆ ☆ ☆ ☆
वसुंधरा पेंडसे नाईक (२७ जून १९४६ – १५ जुलै २०१६ )
वसुंधरा पेंडसे नाईक या मराठी लेखिका व पत्रकार होत्या. सुप्रसिद्ध पत्रकार आप्पा पेंडसे हे त्यांचे वडील. भारतीय क्रिकेट संघातले आंतरराष्ट्रीय कसोटी सामने खेळणारे सुधीर नाईक हे त्यांचे पती.
वसुंधरा पेंडसे नाईक यांना शालांत परीक्षेत जगन्नाथ शंकर शेठ शिष्यवृत्ती मिळाली होती. त्यांनी मराठी, संस्कृत दोन्ही विषयात एम. ए. ची पदवी घेतली. १९६८मध्ये विल्सन कॉलेजात त्या प्राध्यापिका होत्या. नंतर त्या ‘लोकसत्ता’मध्ये उपसंपादक म्हणून रुजू झाल्या. त्यांची साहित्याची आवड आणि कामाचा वकूब बघून १९८० मध्ये ‘लोकप्रभा’ साप्ताहिकाची जबाबदारी त्यांच्यावर सोपवण्यात आली. काही काळातच ‘लोकप्रभा’ साप्ताहिक मराठी परिवारात लोकप्रिय बनले. ‘लोकप्रभेतील त्यांचे सादर ‘शेवटचे पान’हे त्यांचे ‘लोकप्रभे’तील संपादकीय आवर्जून वाचले जायचे. विविध घटनांवर आधारलेले ‘लोकप्रभेचे विशेषांकही त्याकाळी खूप गाजले. त्यांनी काही काळ महाराष्ट्र टाईम्समध्ये ‘सगुण-निर्गुण’ या लोकप्रिय स्तंभासाठी लेखन केले. ‘दै. नवशक्तीच्या पुरवणीच्या संयोजनाची जबाबदारीही काही काळ त्यांनी स्वीकारली होती. १९९१मधे त्या नवशक्तीच्या संपादिका झाल्या. एखाद्या मराठी दैनिकाची संपादिका होणार्यान त्या पाहिल्याच मराठी पत्रकार होत्या. १९९४ ते १९९६ काळात त्यांनी ‘लोकसत्ता’मधे ‘कुटुंबकथा हे सर्वसाधारण कुटुंबात नेहमी उद्भवणार्यात समस्यांवर चर्चा करणारे त्यांचे सदरही वाचकप्रिय झाले.
मुंबई दूरदर्शनवरील संस्कृत भाषेचे सौंदर्य उलगडून दाखवणारा त्यांचा ‘अमृत मंथन’ हा कार्यक्रमही विशेष लोकप्रिय होता. इ. स. १९७९ते १९९२ असा १३ वर्षे चालू होता. या कार्यक्रमात महाकवी, नाट्य याबरोबरच इंजिनियरिंग, अर्थशास्त्र, विज्ञान या विषयांवरचाही अभ्यासपूर्ण आढावा त्यांनी घेतला होता.
वसुंधरा पेंडसे नाईक यांनी भूषविलेली पदे, पुरस्कार, सन्मान
१. अखिल भारतीय मराठी साहित्य परिषदेच्या अध्यक्ष
२. मराठी साहित्य महामंडळाच्या अध्यक्ष
३. महाराष्ट्र राज्य मराठी विकास संस्थेच्या आणि मराठी भाषा अभ्यास केंद्राच्या संचालक
४. भारत निर्माण या संस्थेच्या ९९ सालच्या टॅलेंटेड लेडीज अवॉर्डच्या मानकरी
५. कोकण मराठी साहित्य परिषदेच्या चेंबूर येथे झालेल्या ५ जून २०१०च्या मुंबई जिल्हा साहित्य संमेलनाच्या अध्यक्ष
वसुंधरा पेंडसे नाईक यांची पुस्तके –
१. कुटुंब कथा – भाग १ व२
२. कौटिल्य आर्थशास्त्र परिचय
३. मूल्याधार (मूल्यशिक्षणावरील लेख )
☆ ☆ ☆ ☆ ☆
माधवी देसाई – (२१ जुलै १९३३ – १५ जुलै २०१३)
मराठीतील सुप्रसिद्ध लेखिका माधवी देसाई या भालजी पेंढारकर आणि लीलाताई यांच्या कन्या व सुप्रसिद्ध साहित्यिक रणजीत देसाई यांच्या पत्नी होत्या. आपल्या पतीबरोबरच्या नातेसंबंधांवर आधारलेले त्यांचे आत्माचरित्र ‘नाच ग घुमा’ खूप गाजले. याच्या मराठीत अनेक आवृत्या निघाल्या. याचे हिन्दी आणि कन्नडमध्ये अनुवाद झाले.
‘घे भरारी’ या त्यांच्या कादंबरीवर चित्रपट निघाला. चित्रपटाची कथा, पटकथा, संवाद लेखन त्यांचेच होते. त्यांच्या १५ कादंबर्याघ, एक आत्मचरित्र, काही कथासंग्रह, व्यक्तिचित्रे, आणि अनुवाद मिळून ३५ पुस्तके आहेत.
माधवी देसाई यांची निवडक पुस्तके –
१. कथा एका राजाची – कादंबरी, २. कस्तुरी गंध – कादंबरी, ३. किनारा – कथा ४. कांचनगंगा – कथा, ५. नर्मदेच्या तीरावर – व्यक्तिचित्र, ६.. विश्वरंग – चित्रकार विश्वनाथ नागेशकर यांचे व्यक्तिचित्रण ७. अंजनीबाई मालपेकर – चरित्र, ८. अमृता प्रीतम यांच्या हिन्दी पुस्तकाचा अनुवाद, ९. फिरत्या चाकावरती – हावठण या कोकणी कादंबरीचा अनुवाद १०. महाबळेश्वर शैल यांच्या कोकणी पुस्तकांचे अनुवाद
माधवी देसाई यांना मिळालेले पुरस्कार
सोलापूरयेथील भैरू दामाणी पुरस्कार
सीमावर्ती भागातील ( बेळगाव, कारवार, गोवा ) साहित्य क्षेत्रातील अनेक पुरस्कार
बेळगावजवळ कडोली येथे प्रा. तुकाराम पाटील यांच्या सहकार्याने माधवी देसाई यांनी साहित्य संमेलन सुरू केले. त्यानंतर सीमा भागात साहित्य संमेलने सुरू झाली.
आज ग. वि. केतकर, जयवंत द. जोगळेकर , प्रकाश संत, वसुंधरा पेंडसे नाईक , माधवी देसाई यांचा स्मृतीदिन. त्यानिमित्त त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली.
☆ ☆ ☆ ☆ ☆
श्रीमती उज्ज्वला केळकर
ई–अभिव्यक्ती संपादक मंडळ
मराठी विभाग
संदर्भ : साहित्य साधना – कराड शताब्दी दैनंदिनी, गूगल, विकिपीडिया
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
ई -अभिव्यक्ती -संवाद ☆ १४ जुलै – संपादकीय – सुश्री मंजुषा सुनीत मुळे– ई – अभिव्यक्ती (मराठी)
मराठी लेखक आणि चरित्रकार श्री नारायण कृष्ण गद्रे यांचा आज स्मृतिदिन. ( ७/३/१८७० – १४/७/१९३३ )
श्री गद्रे यांचे प्राथमिक शिक्षण त्या काळाच्या परंपरेनुसार पंतोजींच्या शाळेत झाले. १८८१ सालापासून त्यांच्या इंग्रजी शिक्षणास प्रारंभ झाला. काही वर्षे पुण्याच्या न्यू इंग्लिश स्कूलमध्ये शिकत असतांना त्यांना लोकमान्य टिळक आणि मा. आगरकर हे दोघेही शिक्षक म्हणून लाभले होते . नंतर सन १८९० ते १९२३ एवढा प्रदीर्घ काळ त्यांनी मुंबईमध्ये हवामान खात्यात नोकरी केली.
लो. टिळकांच्या प्रेरणेने सुरु झालेल्या सार्वजनिक गणेशोत्सवात तेव्हा विविध मेळे भरत असत. गद्रे यांनीही १८९५ साली एक मेळा सुरु केला, आणि १९१४ सालापर्यंत तो चालवला. त्यासाठी त्यांनी राष्ट्रभक्तीपर आणि इतर विविध विषयांवर गीते लिहायला सुरुवात केली. इथूनच साहित्यक्षेत्रातली त्यांची वाटचाल सुरु झाली असे म्हणता येते.
पुढे त्यांनी नाटक, कविता, कादंबरी, चरित्र-लेखन, इतिहास-लेखन, अशा विविध साहित्यप्रकारात लेखन केले. काही लेखन त्यांनी ‘दिनकर‘ या त्यांच्या जन्मनावाने, तसेच ‘कृष्णात्मज दिनकर‘ या नावानेही केलेले आहे.
‘मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालय‘ या संस्थेच्या संस्थापक सदस्यांपैकी एक महत्वाचे सदस्य – ही त्यांची आणखी एक विशेष ओळख. १९२३ सालापर्यंत या संस्थेच्या व्यवस्थापक मंडळाचेही ते सभासद होते. स्वतःकडची अनेक पुस्तके त्यांनी या संग्रहालयाला देणगी म्हणून दिली होती.
१९०१ सालापासून पुण्यात प्रकाशित होणाऱ्या ‘सरस्वतीमंदिर‘ या नियतकालिकाच्या प्रकाशनात त्यांचा सक्रीय सहभाग होता. ‘महाराष्ट्र महोदयाचा पूर्वरंग‘ हा त्यांचा तेव्हा गाजलेला लेख याच नियतकालिकात प्रकाशित झाला होता.
त्यांचे इतर साहित्य पुढीलप्रमाणे —
१) कादंबरी — ‘प्याद्याचा फर्जी‘ – अर्थात ‘भोसले घराण्याचा अभ्युदय‘. हिंदुवा सूरज ‘— बाप्पा रावळ चक्रवर्ती. ‘मनूच फिरला ‘ ( कृष्ण तनय )
२) कविता — श्रीमत प्रतापसिंह : पहिला खंड
३) नाटक — अक्षविपाक अथवा संगीत द्युतविनोद. हे नाटक आणि ‘ महाराष्ट्र महोदयाचा पूर्वरंग ‘ हा प्रदीर्घ लेख पुढे १९७१ साली महाराष्ट्र राज्य साहित्य-संस्कृती मंडळाने मुंबई येथे प्रकाशित केला आहे.
४) चरित्रे — कै. प्रो. श्री. ग. जिनसीवाले यांचे चरित्र, कै. पं. विष्णुपंत छत्रे यांचे चरित्र.
५) संपादन — कवीश्वर भास्करकृत शिशुपाल- वध कथा.
श्री. नारायण कृष्ण गद्रे यांना त्यांच्या आजच्या स्मृतिदिनी मनःपूर्वक श्रद्धांजली.
☆☆☆☆☆
सुश्री मंजुषा सुनीत मुळे
ई-अभिव्यक्ती संपादक मंडळ
मराठी विभाग
संदर्भ : विकिपीडिया.
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर ≈
ई-अभिव्यक्ती – संवाद ☆ १३ जुलै – संपादकीय – श्री सुहास रघुनाथ पंडित – ई – अभिव्यक्ती (मराठी)
कै. इंदिरा संत (इंदिरा दीक्षित)
“अजंठ्याच्या कलाकाराची विसरून राहिलेली एक पुसट रेषा माझ्या रक्तातून वाहते आहे”
स्वतःच्या काव्य निर्मितीविषयी असे मत व्यक्त करणा-या आणि कवितेला आपल्या लेखनाचा आणि जगण्याचा गाभा मानणा-या ज्येष्ठ कवयित्री इंदिरा संत यांचा आज स्मृतीदिन.
महाविद्यालयीन जीवनापासून कविता लेखन करणा-या इंदिरा संत यांच्या कविता ज्योत्स्ना, साहित्य, सत्यकथा अशा मासिकांतून प्रसिद्ध होत होत्या. त्यांनी बी.ए., बी.टी., बी.एड्. शिक्षण पूर्ण करून अध्यापनाचे काम केले. कवी व निबंधकार ना. मा. संत यांच्याशी त्यांचा विवाह झाला. 1 941 साली त्या उभयतांचा ‘सहवास’ हा काव्यसंग्रह प्रकाशित झाला. 1946 मध्ये त्यांच्या पतींचे निधन झाले. पुढील सर्व आयुष्य सांसारिक जबाबदा-या व पतिविरहाच्या दुःखात व्यतीत झाल्यामुळे त्याचे प्रतिबिंब त्यांच्या काव्यात दिसून येते. त्यांची कविता त्यामुळेच आत्ममग्नतेतून सार्वत्रिक सुखदुःख व्यक्त करणारी वाटते. निसर्गाच्या माध्यमातून मानवी भावना व्यक्त करणारी त्यांची कविता निसर्गा इतकीच चिरतरूण वाटते. स्वानुभवातून साधलेला शब्दसंवाद एक वेगळाच सौंदर्यानुभव देऊन जातो. त्यांचे गद्य लेखनही नितळ काव्यात्मक अनुभूती देणारे आहे.