मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ “चंदामामातर्फे ओवाळणी” ☆ डॉ. शिरीन वळवडे ☆

डॉ. शिरीन वळवडे

 

? इंद्रधनुष्य ?

☆ “चंदामामातर्फे ओवाळणी” ☆ डॉ. शिरीन वळवडे ☆

(सौजन्य – ‘विपुलश्री’ – जुलै 2026)

पश्चिम सहारा डेझर्टमध्ये अलिकडे एक उल्का सापडली. ती अबुधाबीच्या नॅचरल हिस्ट्री म्युझियममध्ये ठेवण्यात आली आहे. उल्केचं, ‘नॉर्थ वेस्ट आफ्रिका12691/NWA12691 असं नामकरण करण्यात आलं. परीक्षणांती, हा चंद्राचा तुकडा आहे, असा निष्कर्ष काढण्यात आला. चंदामामाने ही आपल्याला भेट पाठवली.

या उल्केचे वजन साडे तेरा किलो आहे. अनेक खनिजं तिच्यात आहेत. त्यामुळे ती रंगीबेरंगी दिसते. शास्त्रज्ञांच्या अनुमानानुसार एखादा धूमकेतू किंवा एखादी उल्का चंद्रावर आदळून हा टवका निघाला असावा. मुळात तो खूप मोठ्या आकाराचा असावा. कित्येक वर्षे तो अवकाशात फिरत असावा. पृथ्वीकडे तो खेचला जाऊन, तो सहारा वाळवंटातही हजारो वर्षे पडून राहिला असावा. कोरडेपणामुळे तो सुस्थितीत राहिला असावा. वाळवंटाच्या एकसुरी रंगाच्या पार्श्वभूमीवर हा रंगीबेरंगी तुकडा उठून दिसला व सापडला.

चंद्रावरून तिथल्या दगड-मातीचे नमुने आणायला मानवानं किती प्रयत्न केले. किती पैसा खर्च केला… 

…. पण ही उल्का म्हणजे चंदामामाने आपल्याला धाडलेली अनोखी भेट आहे.

© डॉ. शिरीन वळवडे

मो. 9911244701

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ “पती-पत्नी : आयुष्याचे शेवटचे सोबती” – लेखक – अज्ञात  ☆ प्रस्तुती – श्री अनिल वामोरकर ☆

श्री अनिल वामोरकर

📖 वाचताना वेचलेले  📖

☆ “पती-पत्नी : आयुष्याचे शेवटचे सोबती” – लेखक – अज्ञात ☆ प्रस्तुती – श्री अनिल वामोरकर ☆

लग्न म्हणजे फक्त फोटोमध्ये हसणाऱ्या दोन चेहऱ्यांची गोष्ट नाही. ती एका घरात राहणाऱ्या दोन व्यक्तींची कहाणी आहे, ज्या हजारो वेळा तुटतात, पण जगाला न कळता पुन्हा स्वतःला जोडून घेतात.

पती-पत्नीच्या नात्यात फक्त प्रेमच नसते. त्यात राग असतो, अहंकार असतो, दुःख असते. असेही दिवस येतात की दोघेही एकमेकांशी बोलत नाहीत. पत्नीच्या मनात वेदना असते की, “हे कधीच बदलणार नाहीत. ” तर पतीच्या मनात खंत असते की, “ही मला कधीच समजून घेत नाही. ”

पण गंमत बघा…

तोच पती उशिरा घरी आला की पत्नी दाराच्या आवाजाने जागी होते. आणि तोच पती रागात असला तरी पत्नी जेवली नाही, हे कळल्यावर तिच्यासमोर ताट वाढतो.

यालाच विवाह म्हणतात.

मुलं लहान असताना घर गजबजलेलं असतं. आई-वडील स्वतःला मुलांच्या शिक्षणात, लग्नात, नोकरीत, नातवंडांत पूर्णपणे झोकून देतात. पण एक दिवस मुलं आपापल्या आयुष्यात रमून जातात. हळूहळू घर रिकामं होतं.

आणि मग फक्त दोघेच उरतात.

एकेकाळी त्रासदायक वाटणारे घोरणे, एखाद्या दिवशी ऐकू आले नाही तर डोळे पाणावतात. “इतकं बोलू नकोस, ” म्हणून ज्याला रागावलं होतं, तो आवाज कायमचा शांत झाला तर घराच्या भिंतीसुद्धा ओसाड वाटतात.

एखादा माणूस गेल्यावर सांत्वनासाठी अनेकजण येतात. पण रात्री पलंगावरील रिकामी जागा कोणी भरून काढू शकत नाही. औषध देणारा हात, “जेवलास/जेवलीस का? ” असे विचारणारा आवाज, रागामागे दडलेली काळजी दाखवणारे डोळे — हे सगळं परत आणता येत नाही.

म्हणून लक्षात ठेवा…

सर्वोत्तम जोडपे ते नसते, जे कधीच भांडत नाही.

सर्वोत्तम जोडपे ते असते, जे भांडणानंतरही एकमेकांची साथ सोडत नाही.

 वैवाहिक जीवनात प्रेमापेक्षा समजूतदारपणा मोठा असतो.

समजूतदारपणापेक्षा संयम मोठा असतो.

आणि संयमापेक्षाही मोठं असतं ते मन, जे शेवटपर्यंत एकत्र राहण्याचा निर्णय घेतं.

खोडकरपणा, लाज, भांडणं, शांतता, संघर्ष, आनंद, अश्रू, हसू, तडजोड — या सगळ्यांनी मिळून विवाह पवित्र बनतो.

आपला जोडीदार जिवंत असतानाच त्याची किंमत ओळखा. कारण जिवंतपणी दिलेला सन्मान हा मृत्यूनंतर गाळलेल्या अश्रूंहून अधिक पवित्र असतो.

हे नेहमी लक्षात ठेवा…

आयुष्यात परिपूर्ण जोडीदार कधीच मिळत नाही. पण तुमच्या अपूर्णता स्वीकारून शेवटपर्यंत तुमची साथ देणारा जोडीदार मिळणे, याहून मोठे भाग्य दुसरे नाही.

लेखक : अज्ञात

प्रस्तुती – श्री अनिल वामोरकर

अमरावती

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ महावस्त्राचे पदर – भाग ५ ☆ श्री विश्वास देशपांडे ☆

श्री विश्वास देशपांडे

? विविधा ?

महावस्त्राचे पदर – भाग ५ ☆ श्री विश्वास देशपांडे ☆

‘आजोबा’ (सुरकुत्यांमधील शहाणपण)

​’नात्यांचं महावस्त्र’ विणताना आपण आतापर्यंत आईची ‘मायेची पैठणी’, बाबांची ‘सह्याद्रीची ढाल’ आणि आजीच्या ‘संस्कारांची शिदोरी’ अनुभवली. या महावस्त्राला अधिक बळकट, समृद्ध आणि आदरयुक्त बनवणारा, कुटुंबाचा भक्कम पाया असणारा आणि अनुभवाचा समृद्ध सुवर्णकळस चढवणारा पुढचा महत्त्वाचा पदर म्हणजेच ‘आजोबा’! आजोबा हे नातं म्हणजे वात्सल्य आणि शिस्तीचा एक अद्भूत सुवर्णमध्य आहे. ते कुटुंबासाठी केवळ एक ज्येष्ठ व्यक्ती नसतात, तर ‘वात्सल्याची सावली आणि संस्कृतीचा वारसा’ असतात, ‘अनुभवाचे संचित आणि सुरकुत्यांमधील जिवंत शहाणपण’ असतात.

​मी आजी-आजोबांसारख्या ज्येष्ठ व्यक्तींना समृद्धीचे ‘महावृक्ष’ म्हणतो. जंगलातील वृक्ष आपण सगळ्यांनी पाहिले असतील. एक वृक्ष मोठा होण्यासाठी अनेक वर्षे लागतात. कितीतरी उन्हाळे-पावसाळे त्यांनी पाहिलेले असतात; वादळ, वारा, पाऊस स्वतःच्या अंगावर झेललेला असतो. झाडाचे वय कसे काढतात, हे आपण विज्ञानातून शिकलो आहोत. झाडाच्या खोडाचा जेव्हा आडवा छेद घेतला जातो, तेव्हा त्यावर दिसणारी वर्तुळाकार वलये जेवढी जास्त, तेवढे त्या झाडाचे वय अधिक आणि ते झाड तेवढेच जुने व समृद्ध मानले जाते. अशाच सुरकुत्या जेव्हा आजोबांच्या अंगावर आपल्याला दिसतात, तेव्हा त्या केवळ वयाचे लक्षण नसून त्यांच्या समृद्ध आयुष्याचं आणि अथांग अनुभवाचं दर्शन घडवणाऱ्या असतात.

​त्यांचं हे मोठेपण व्यक्त करणारे ‘पितामह’ आणि ‘मातामह’ हे अतिशय सार्थ व वजनदार शब्द आपल्या संस्कृतीत आहेत. वडिलांपेक्षाही ज्यांचं स्थान वरचं आहे, अशी आदरणीय व्यक्ती म्हणजे पितामह! आईचे वडील आणि वडिलांचे वडील म्हणजेच आपले आजोबा. महाभारत काळात भीष्मांना ‘पितामह’ म्हणून ओळखलं जायचं आणि त्यांचा केवढा आदर त्या काळातली सगळी मंडळी करायची, हे आपण जाणतोच. आजी-आजोबांचे छत्र आणि त्यांची निर्मळ, अपार माया ज्यांना लहानपणी लाभली, ती मुलं खरोखरच खूप भाग्यवान! आई-वडिलांपेक्षा देखील संस्कारांचं खरंखुरं बाळकडू आजी-आजोबांकडून नातवंडांना मोठ्या प्रमाणात मिळतं आणि त्यामुळेच त्यांचं व्यक्तिमत्त्व नकळत समृद्ध होत जातं.

​आजोबांच्या चेहऱ्याकडे कधी आपण निरखून पाहिलं आहे का? त्यांच्या चेहऱ्यावरच्या आणि हातावरच्या प्रत्येक सुरकुतीत आयुष्यातील संघर्षाचा, कष्टाचा आणि यशाचा एक मोठा इतिहास दडलेला असतो. त्यांनी अनुभवलेलं जग, पाहिलेले ऋतूंचे बदल आणि आयुष्यात आलेले चढ-उतार हे संपूर्ण कुटुंबासाठी एखाद्या मार्गदर्शक दीपस्तंभासारखे असतात. जेव्हा संपूर्ण कुटुंब किंवा प्रपंच एखाद्या वैचारिक वादळात सापडतो, काय निर्णय घ्यावा हे सुचत नाही, अशा वेळी आजोबांचा एक शांत, धीरगंभीर शब्दही सगळ्या वादळाला शांत करतो आणि घरातील प्रत्येकाला जगण्याचं बळ देऊन जातो.

​शिस्त आणि हट्टाचा सुवर्णमध्य म्हणजे आजोबा! काळाचा एक काळ असा असतो जेव्हा हेच आजोबा आपल्या मुलांसाठी (म्हणजे आजच्या आई-वडिलांसाठी) अत्यंत कडक, करारी आणि शिस्तप्रिय ‘बाबा’ असतात. त्यावेळी त्यांचा घरात एक वेगळाच दरारा असतो. पण जेव्हा घरात नातवंडं जन्माला येतात, तेव्हा त्या जुन्या करारी शिस्तीचं रूपांतर एका अथांग, मुलायम मायेत कसं होतं, हे पाहणं निसर्गाचा एक चमत्कारच आहे. म्हणतात ना, ‘मुद्द्लापेक्षा व्याज जास्त प्रिय असतं’, आजोबांच्या बाबतीत हे तंतोतंत खरं ठरतं.

​मला आजोबांचं प्रेम दुर्दैवाने स्वतःच्या बालपणात लाभू शकले नाही; कारण माझे वडिलांचे वडील आणि आईचे वडील हे दोघेही माझा जन्म होण्याआधी, फार पूर्वीच देवानघरी गेले होते. परंतु आजोबा म्हणून माझ्या वडिलांचे जे निस्सीम प्रेम असायचे, ते माझ्या मुलांना मात्र भरभरून लाभले, याचा मला आनंद आहे. माझे वडील जेव्हा वारले, तेव्हा त्यांचे वय ८८ वर्षे होते. त्यांनी नातवंडांवर मायेची पाखर घालत त्यांना खूप प्रेम लावले. माझा मुलगा तर त्यांच्यावर अतिशय जीव लावायचा आणि त्यांच्याबद्दल त्याला प्रचंड आदर होता; तो त्यांना आदराने नेहमी ‘सरकार’ म्हणून हाक मारायचा!

​माझी मुलगी लहान असताना जेव्हा घरात ‘गुलाबाई’ बसवायची, तेव्हा तिचे लाड पुरवण्यासाठी आजोबा बाजारातून कौतुकाने वेगवेगळ्या प्रकारचा खाऊ घेऊन यायचे. आजोबा म्हणून लाभलेले त्यांचे ते भरभरून प्रेम आणि मायेची ऊब माझी मुलं आजही विसरू शकत नाहीत. आजोबा असण्याचं आणि नातवंडं खेळवण्याचं हे कौतुक प्रत्येक घराचे भाग्य वाढवत असतं.

​आई-वडिलांचा ओरडा खाणाऱ्या, अभ्यास न केल्यामुळे किंवा हट्ट केल्यामुळे शिक्षा भोगणाऱ्या नातवंडांना हक्काची पाठराखण आणि संरक्षणाची भक्कम ढाल मिळते ती फक्त आजोबांच्यामुळेच! जेव्हा आई-बाबा मुलांवर रागावतात, तेव्हा आजोबा ढाल बनून मध्ये उभे राहतात. ते केवळ नातवंडांचे लाड करत नाहीत, तर वेळप्रसंगी मुलांची (आई-बाबांची) सुद्धा प्रेमळ शब्दांत कानउघाडणी करतात. “आम्ही तुम्हाला यापेक्षा जास्त मारलं असतं तर तुम्ही आज इथे नसता, मुलांना प्रेमाने शिकवा,” हा त्यांचा हक्काचा सल्ला घरातील वातावरण पुन्हा आनंदी करून जातो. घराचे, नात्यांचे आणि अगदी वास्तूचे जे सूक्ष्म कोने-कोपरे आई-बाबांना समजत नाहीत, ते आजोबांच्या एका शब्दाने उलगडतात.

​आजोबा हे आपल्या संस्कृती आणि मूल्यांचा जिवंत दुवा आहेत. रामायण-महाभारताच्या गोष्टी, जुने लोकव्यवहार, नात्यांमधील ओलावा, कौतुकाचे कौटुंबिक रीतीरिवाज आणि संस्कारांची खरीखुरी शिदोरी नातवंडांपर्यंत पोहोचवण्याचं काम आजोबा अगदी सहजतेने, हसत-खेळत करतात. त्यांच्या ओसरीवर किंवा बैठकीत बसून घालवलेला वेळ हा केवळ खेळ नसतो, तर मुलांच्या नकळत त्यांच्या कोऱ्या मनावर घडणारं एक समृद्ध सुसंस्कारी विश्व असतं. आई-बाबा आपल्याला या जगात कसं जगायचं, कसं कमवायचं हे भौतिक ज्ञान देतात; पण आजोबा आपल्याला आपल्या मातीशी, आपल्या मुळांशी आणि परंपरेशी घट्ट जोडून ठेवतात.

​निर्मळ मैत्रीचे हक्काचे ठिकाण म्हणजे आजोबा! वयाचे अथांग अंतर विसरून, आपल्या पांढऱ्या केसांची पर्वा न करता, नातवंडांच्या बालविश्वात लहान मूल होऊन रमेलेले आजोबा हे जगातले सर्वात उत्तम मित्र असतात. कधी ते नातवंडांबरोबर बुद्धिबळ खेळून त्यांना बुद्धिबळाचे डावपेच आणि धडे देतात, तर कधी त्यांना आनंद देण्यासाठी स्वतः घोडा बनून पाठीवर बसवतात. संध्याकाळच्या पाऊलवाटेवर त्या चिमुकल्या हातांचे बोट धरून चालताना जगाची ओळख करून देणारे आजोबा हे प्रत्येक घरातलं एक हळवं आणि अत्यंत आदरयुक्त पान असतं.

​घरातल्या या वटवृक्षाचे कौतुक फक्त घरापुरते मर्यादित नसते. समाजात, ओळखीच्या माणसांमध्ये किंवा गावात जेव्हा चारचौघे एकत्र येतात, तेव्हा आजोबा आपल्या नातवंडांच्या गुणांचे, त्यांच्या छोट्या-छोट्या यशाचे कौतुक एवढ्या मोठ्या अभिमानाने सांगतात की, ऐकणाऱ्यालाही त्यांच्या भाग्याचा हेवा वाटावा. नातवंडांचे गुण सांगताना त्यांच्या डोळ्यांत चमकणारा तो सार्थ अभिमान कोणत्याही पदवीपेक्षा मोठा असतो.

​कधी कधी मनात अशी शंका येते की, आपण भौतिक सोयी-सुविधा मिळवून खरंच प्रगती करत आहोत का? कारण आज एकविसाव्या शतकाच्या उत्तरार्धात, बदलत्या कौटुंबिक चौकटीमुळे हे चित्र खूपच बदलले आहे. एकत्र कुटुंब पद्धती जाऊन ‘विभक्त कुटुंबे’ आली आणि शहरीकरणाच्या फ्लॅट संस्कृतीमध्ये आजची लहान मुले आजोबांच्या या अथांग मायेला मुकत चालली आहेत. आजी-आजोबांमुळे भक्कम असणाऱ्या घराच्या भिंती आज केवळ एक पोकळ डोलारा म्हणून उभ्या राहत आहेत की काय, असे मला वाटते.

​आज ‘आजी-आजोबा’ म्हटले की अनेकांना थेट ‘वृद्धाश्रम’ डोळ्यांसमोर येतो. याला समाजाची प्रगती म्हणायचे की अधोगती? हा खरोखरच विचार करण्यासारखा गंभीर प्रश्न आहे. नात्यांचा हा भक्कम पदर आज काळाच्या ओघात विरत चाललेला आहे. मुले आजोबांच्या वात्सल्याच्या छायेला मुकत आहेत, ही आजच्या काळातील सर्वात मोठी हानी आहे. ‘नटसम्राट’ चित्रपटात किंवा नाटकात आजी-आजोबांचे आपल्या नातवंडांवर किती अथांग प्रेम असते, ते पाहून डोळे हमखास ओलावतात; परंतु आजकालच्या जगात घरात नातवंडांवर जीव लावणारी अशी ज्येष्ठ माणसे देखील काहींना नकोशी झालेली दिसतात.

​घराला घरपण आणि नात्यांच्या या महावस्त्राला भक्कम आधार देणारा हा ‘आजोबा’ नावाचा पदर संपूर्ण घराला आपल्या मायेच्या धाग्यात घट्ट बांधून ठेवतो. हा पदर जेवढ्या सन्मानाने आणि आदराने घरात जपला जाईल, तेवढा आपला समाज आणि आपली पुढची पिढी अधिक सुदृढ व सुसंस्कारी होईल.

 © श्री विश्वास देशपांडे

चाळीसगाव

प्रतिक्रियेसाठी ९४०३७४९९३२

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ “माझी वारी ! माझा अनुभव !”- लेख क्र. ७ ☆ श्री संभाजी बबन गायके ☆

श्री संभाजी बबन गायके

??

माझी वारी ! माझा अनुभव ! – लेख क्र. ७ ☆ श्री संभाजी बबन गायके 

दिंडी अशी वाटचाल करते!

 पंढरपूर जर समुद्र आहे अशी कल्पना केली तर या समुद्राला येऊन मिळणा-या दिंड्या या नद्या म्हटल्या पाहिजेत. ज्ञानोबाराय गंगा, तुकोबाराय यमुना तशाच इतर संतांच्या दिंड्या जणू लहान-मोठ्या नद्या, ओढे म्हणावेत अशा. पंढरीनगरीमध्ये प्रवेश करण्याआधी सुमारे पाच-आठ मैलांवर वाखरी नावाचं छोटं गाव आणि मोठं माळरान लागतं. दिंड्यांचे हे सर्व प्रवाह या ठिकाणी एकजीव होतात. ज्ञानदेव-निवृत्तीनाथ-मुक्ताई येथेच एकमेकांना भेटतात. सोपानदेव तर माउलींच्या सोबतच चालत आलेले असतात. तिकडून तुकोबारायही या मेळ्यात सामील होतात. दुपारचा उभे रिंगण सोहळा याच माळावर रंगतो. पंढरी डोळ्यांना दिसत असते. थकलेल्या पावलांच्या मनातून थकवा आता नाहीसा झालेला असतो. आता केवळ प्रतीक्षा उरलेली असते.

 रिंगण सोहळा म्हणजे वारीतील लष्करी शिस्तीचा परिपाठच असतो जणू. यानंतर पावले पंढरीच्या दिशेने चालायला लागतात. अंतर तसे इतर मुक्कामांच्या मानाने अगदीच कमी असले तरी सर्व प्रवाह एकत्रित झाल्याने दिंड्या रात्री उशीरापर्यंत पंढरीत पोहोचत असतात. अनेक दिंड्या मुख्य मंदिरापासून काहीशा दूरवर मुक्कामी असतात राहुट्या ठोकून. ज्यांच्या गावच्या धर्मशाळा पंढरीनाथाच्या मंदिराच्या परिसरात आहेत, त्यांना तसे सोयीचे जाते. आता पंढरपूरचा विस्तार चारही बाजूंनी झालेला आहे. महाराष्ट्रातील अनेक गावांनी पंढरपूर परिसरात जागा विकत घेऊन स्वत:च्या धर्मशाळा उभारल्या असून त्यांची बांधकामे दानशूर लोकांच्या आर्थिक साहाय्यातून होत असतात. धर्मशाळांत स्वयंपाकाची स्वतंत्र व्यवस्था असते. त्यासाठी लागणारी भांडी, शिधाही दान स्वरूपात प्राप्त होत राहतो. वारीत दिंडीच्या भोजनाचा खर्च करण्याला पंगत देणे असे म्हटले जाते. द्वादशीला दिली जाणारी पंगत विशेष महत्त्वाची समजली जाते. या दिवशी सूर्योदयापूर्वीच एकादशीचा उपवास सोडून भोजन करण्याचा संकेत आहे. त्यामुळे द्वादशीला अगदी भल्या पहाटे स्वयंपाकाची तयारी सुरु केली जाते.

 परंतू एका वारक-याचा इथपर्यंतचा प्रवासही समजून घेण्यासारखा असतो. गावातील किंवा आसपासच्या काही गावांतील वारकरी मंडळी एकत्र येऊन दिंडीची स्थापना करतात. या दिंडीस परिसरात होऊन गेलेले संत, अध्यात्मिक गुरु, ग्रामदैवत यांचे नाव दिलेले असते. ही दिंडी संबंधित पालखी सोहळ्याकडे नोंदवावी लागते. त्यानुसार सोहळा व्यवस्थापन या दिंडीला नोंदणी क्रमांक देतात. या नावाचे फलक तयार करून ते दिंडीच्या वाहनांवर लावले जातात. सोहळ्यात जे रथ चालतात त्या रथाच्या लगेचच लागून पुढे चालणारी दिंडी ही रथापुढे क्रमांक एक अशी ओळखली जाते. तिच्या पुढची क्रमांक दोन अशा क्रमाने इतर दिंड्यांना क्रमांक मिळतात. तसेच रथामागील दिंड्यांच्या बाबतीत होते. रथामागे लगेच असणारी दिंडी ही रथामागे दिंडी क्रमांक अशी ओळखली जाते. या दिंड्या याच क्रमाने वारीत चालाव्यात असे शिस्तीसाठी अपेक्षित असते. आणि ही शिस्त पाळण्याचा प्रयत्न नेटाने केला जातो. सोहळ्याचे चोपदार ही शिस्त पाहतात.

 सोहळ्यापुढे चौघड्याचे वाहन असते. तुतारी वादक असतात. मानाचा अश्व असतो. त्यासाठी खास गणवेशधारी स्वार नेमलेले असतात. पालखी रथ ओढण्यासाठी बैलांच्या जोड्या वापरल्या जातात. आणि हा मान आपल्या बैलांना मिळावा, यासाठी शेतकरी बांधव भक्तीभावनेने चढाओढ करतात.

 पालखी जागेवरून पुढे जाण्यासाठी निघण्यापूर्वी शंखनाद केला जातो. चोपदारांच्या हातात मानदंड असतो. त्या दंडाच्या इशा-यावर थांबणे, पुढे जाणे या क्रिया होतात.

 पालखी रथापुढे दिंड्या क्रमाने उभ्या राहिल्या की चोपदार सूचना आणि इशारा देतात. यात पालखी कुठे विसावा घेणार आहे, कुठे मुक्काम करणार आहे, किती वाजता प्रस्थान ठेवणार आहे, याची माहिती दिली जाते. रात्रीच्या मुक्कामासाठी पालखी तळावर पोहोचल्यानंतर समाज आरती होण्यापूर्वी पालखी प्रमुख, चोपदार दिंड्यांना सूचना देतात, हरवल्या-सापडलेल्या वस्तूंची यादी वाचून दाखवली जाते, पूर्वी पोस्टखाते दिंडीमध्ये पोस्टकार्ड्सही पोहोचवत असे. म्हणजे दिंडी क्रमांक आणि नाव लिहिलेले पत्र गावातील पोस्ट ऑफिसमध्ये द्यायचे… पोस्टखाते वारीमार्गावर ज्याठिकाणी शक्य असेल त्या ठिकाणी सोहळा प्रमुखाकडे ही पत्रे नेऊन देत असे. दिंडीत चुकलेल्या व्यक्तींच्या नावांचाही पुकारा केला जातो. अशावेळी एखाद्या दिंडीला काही सूचना द्यायच्या असतील, तक्रार नोंदवायची असेल अशावेळी संबंधित दिंडीमधील लोक टाळांचा गजर करीत राहतात. तो ऐकून सोहळा प्रमुख त्यांच्याशी तेथेच संपर्क साधतात. त्यानंतरच आरती म्हटली जाते. आणि मगच वारकरी आपापल्या मुक्कामाच्या ठिकाणांकडे जातात. पालखीतील पादुकांचा मुक्काम खास उभारण्यात आलेल्या तंबूत किंवा गावातील मंदिरात असतो. स्थानिक लोक या ठिकाणी पादुकांचे दर्शन घेऊ शकतात. गावकरी लोक वारकरी मंडळीची भोजनाची व्यवस्था करतात. पालखी तळावर सोहळ्यातर्फे मुक्कामाच्या जागी कीर्तन आयोजित केले जाते.

 इकडे दिंडीमधील वारक-याचा दिनक्रम साधारण असा असतो. पहाटे लवकर उठून आपापली वळकटी व इतर साहित्य दिंडीच्या वाहनात ठेवायचे. आजचे आंघोळीचे कपडे, आवश्यक वस्तू, अल्पोपाहाराचे पदार्थ सोबत घ्यायचे. मुक्कामाच्या ठिकाणी एवढ्या मोठ्या समुद्यासाठी प्रात:र्विधीसाठी जागा उपलब्ध नसते. यामुळे बरेच वारकरी लवकर उठून पालखीच्या मार्गावर बरेच अंतर पुढे चालत जातात. पूर्वी पालखी मार्गावर शेती, मोकळ्या जागा, विहिरी, तळी इत्यादी भरपूर असे. पुढे चालत गेलेले वारकरी योग्य ठिकाण शोधून आंघोळ, अल्पोपहार उरकून आपल्या दिंडीची प्रतीक्षा करीत रस्त्याच्या कडेला थांबून राहतात. आंघोळीसाठी वापरलेले कपडे शक्य होतील तिथे धुवून वाळायला घातले जातात. गावातून रथ निघाल्यानंतर आपण जिथे बसलेलो असू तिथपर्यंत आपली दिंडी येण्यास बराच अवकाश मिळतो. आपल्या दिंडीचे विणेकरी आणि इतर सभासद चालत येत असतात. आपण सोहळ्याच्या रथाच्या मार्गावरची माती कपाळाला लावायची आणि वाटेवर पाऊल टाकायचे. रथ, रथापुढे चालणारा अश्व आपल्याला भेटेल तिथे नमस्कार करून घ्यायचा आणि वाट चालायला लागायची.

कोणताही मोठा पालखी सोहळा एकावेळी सलग तास-दीड तासापेक्षा जास्त वेळ सलग चालत नाही. वाटेत अनेक गावे लागतात. स्थानिक नागरिक पालखीच्या दर्शनार्थ मार्गावर मोठ्या संख्येने उभे असतात. त्यांच्यासाठी काही क्षण रथ थांबवला जातो. वाटेत विसावा घेण्याच्या जागा ठरलेल्या असतात. त्यामुळे रथ ओढणारे बैल, चालणारे वारकरी यांना अल्प विश्रांती मिळत राहते. दुपारच्या भोजनाच्या ठिकाणी दिंडीची वाहने आधीच येऊन थांबलेली असतात. आपल्याकडील पिशवी या वाहनांत ठेवायची. दुपारचे भोजन उरकायचे आणि थोडे पुढे चालत जाऊन विश्रांतीसाठी जागा शोधायची. काही वेळाने रथ निघतो… आपली दिंडी शोधायची आणि सामील व्हायचे. दिवसभर आपण आणि दिंडी यांची गर्दीमुळे चुकामुक झालेली एकवेळ चालते. पण दिवसाच्या शेवटी मात्र दिंडी सोडून चालत नाही. प्रचंड गर्दी असते. दिंड्यामध्ये शिस्तबद्ध वाटचाल असते. कुणी कुणाला मध्ये शिरू देत नाही. अन्यथा माणसांची चुकामूक होऊ शकते. अंधार पडू लागलेला असतो.. त्यामुळे आपापल्या दिंडीसोबत चालत राहिले की मुक्कामाची जागा शोधण्याची वेळ येत नाही… आपल्या दिंडीच्या चोपदारांच्या मार्गदर्शनानुसार झपाझप चालत राहायचे की झाले! दिंडीच्या वाहनातून आपली वळकटी खाली घ्यायची, आपल्या ठरलेल्या तंबूत, राहुटीत वळकटी घालायची आणि क्षणभर विश्रांती घ्यायची. काही वेळाने रोजच्या नियोजनाप्रमाणे प्रवचनाचा कार्यक्रम असतो. तो झाल्यावर पंगती पडतात. रात्रीच्या अंधारात, गर्दीत तंबूपासून दूर गेले की पुन्हा तो तंबू आणि दिंडी सापडणे अवघड होऊन जाते… कारण सर्वच तंबू सारखेच भासतात. रात्री अनोळखी लोकांना कुणी त्यांच्या तंबूत आश्रय देईलच असे नसते. अशावेळी पोलिसांची मदत घ्यावी लागते. जेवण उरकल्यावर ज्यांना आवड, सवड असेल असे नेमाचे लोक दिंडीच्या मुख्य तंबूत जमतात. इथे भजनाची व्यवस्था असते. वारकरी रात्री उशीरपर्यंत अभंग गात बसतात… याला जागर म्हणतात… रात्र पुढे सरकत जात असते… कुठे ना कुठे भजन सुरूच असते… दमलेले वारकरी झोपून जातात. काही मुक्काम तर अक्षरश: स्मशानांच्या बाजूलाही असतात. माळरान असते, काटेकुटे असतात, अंधार असतो… पण शारीरिक थकवाच इतका असतो की कशाचाही विचार मनात येत नाही. हल्ली मोबाईल आणि इतर साधने आहेत. पूर्वी तारीख आठवत नसे, वेळ समजत नसे. घरची आठवण येत नसे. काही संपर्काचे साधनही नसे… आणि ते बरेच होते. हल्ली मोबाईलमुळे चार्जिंगची काळजी वाढली आहे!

 आणखी एक गोष्ट वारकरी करतात. जसजसा सोहळा पंढरपूरजवळ जात राहतो, काही ठिकाणी दोन दोन दिवस मुक्काम पडतो अशावेळी काही वारकरी मिळेल त्या वाहनांनी पंढरपूरला पोहोचतात. दर्शन घेतात आणि पुन्हा मुक्कामाच्या जागी परततात. कारण यात्रा काळात विठ्ठलदर्शन करायला प्रचंड मोठी बारी लागते. नेमाचे वारकरी मात्र दोन दोन दिवस बारीत उभे राहून दर्शन करूनच माघारी फिरतात! काही ज्येष्ठ वारकरी पुढील चार महिने अर्थात चातुर्मासानिमित्त तिथेच मुक्कामी राहतात. तर काही गुरु पौर्णिमेच्या काल्याचा प्रसाद घेऊनच घरी परततात.

 पंधरा-अठरा दिवस घरापासून दूर राहिलेले वारकरी मात्र द्वादशीचा उपवास सोडला रे सोडला की काहीही करून घरी परतण्याचा प्रयत्न करतात. माघारी जाणारे दिंडीची काही वाहने, एस. टी. बसेस एकदम भरभरून जातात… संसाराची ओढच तशी असते. पूर्वी बहुसंख्य वारकरी शेतकरी वर्गातून आलेले असत. शेतीची कामेही डोक्यावर असत. पुढे नोकरदार मंडळी, व्यावसायिक लोकांना रजेचा प्रश्न असतो. पुण्याच्या आसपासच्या गावांत राहणा-या काही जणांना अगदी आळंदी किंवा देहूपासून वारीत सहभागी होता येत नाही. अशी मंडळी मग पुण्यापासूनच्या पुढच्या मुक्कामी दिंडीत सामील होतात! हे अनेक दृष्टीने सोयीचे ठरते.

काही लोक दरवर्षी एक एक मुक्काम चालतात. म्हणजे सासवड येथे आपले वाहन आधीच पाठवायचे किंवा येताना वाहन व्यवस्था पहायची. पुण्यातून सासवडला चालत जायचे. सासवडवरून रात्री पुण्यात माघारी यायचे. पुढील वर्षी सासवडला रात्री पोहोचायचे. वाहन पुढील मुक्कामी पाठवायचे… सासवड ते जेजुरी चालत जायचे व रात्री पुण्यात परत यायचे! लोक अशा नानाप्रकारे वारीत सहभागी होत असतात.

 वारीपूर्वी चालण्याचा सराव केलेला बरा असतो. अंगमेहनत, दूर अंतर चालणे इत्यादीची सवय असलेल्या शेतकरी, ग्रामीण भागातील वारका-यांना वाटचालीचे फारसे श्रम वाटत नाहीत, म्हणून आजही नव्वदी, शंभरी गाठलेले ग्रामीण भागांतील वारकरी भेटू शकतात. शहरी लोकांना मात्र सराव आवश्यक असतो. दूरचे अंतर सलग चालण्यासाठी पादत्राणे योग्य निवडावी लागतात. त्यांचा सराव पायांना करून घ्यावा लागतो.. अन्यथा त्रास होऊ शकतो! नेहमीची औषधे सोबत ठेवणेही श्रेयस्कर ठरते! प्रत्येक दिंडी खर्चासाठी ठराविक शुल्क अर्थात भिशी आकारते. वारी तशी सोपी आहे… मानसिक तयारी मात्र पाहिजे!

अर्थात परिस्थितीनुसार परंपरा, पद्धती निरनिराळ्या असू शकतात.

– लेख क्र. ७  

© श्री संभाजी बबन गायके 

पुणे

9881298260

≈ संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ कौतुकाचे दोन शब्द! ☆ श्री सुधीर करंदीकर ☆

श्री सुधीर करंदीकर

??

☆ कौतुकाचे दोन शब्द! ☆ श्री सुधीर करंदीकर

आपल्याला मदत करणाऱ्याचे अभिवादन करण्यात किंवा त्यांना धन्यवाद देण्यात आपण (म्हणजे बरेच जण) नेहमीच चिक्कूपणा करत असतो, कदाचित त्यात स्वतःचा आपण कमीपणा समजतो.

  • आपण ऑटो रिक्षा ने प्रवास करतो, उतरल्यावर मीटर बघून पैसे देतो, आणि व्यवहार पूर्ण करतो आणि चालायला लागतो. आपण थोडासा पॉज घेतला आणि विचार केला, तर लक्षात येईल कि काहीतरी मिसिंग आहे. वेड्यावाकड्या ट्रॅफिक मध्ये ड्रायव्हर नी आपल्याला आरामदायी होईल अशी रिक्षा चालवली, आपल्याला त्यांनी सुरक्षितपणे आपल्या इच्छित स्थळी पोहचवले, त्याबद्दल बोलून आणि मनापासून  त्यांना धन्यवाद द्यायला काय हरकत आहे. थोडं कौतुक करायला काय हरकत आहे. पुढच्या वेळेस असं करून बघा आणि ड्रायव्हरच्या चेहेऱ्यावरचा आनंद बघा. 
  • आपण रस्त्याच्या बाजूला हातगाडीवर  शहाळ्याचं पाणी पितो, पैसे देतो आणि पुढे निघतो. तोंडाला शहाळ्याचा एक वेगळाच गोडवा आलेला असतो आणि पोट पण शांत झालेले असते. शहाळ सोलायला चांगलंच कठीण असतं आणि हाताला चाकू लागण्याची भीती असतेच असते. शहाळी विकणारा प्रेमानी शहाळं सोलून त्यामध्ये स्ट्रॉ ठेवून आपल्या हातात देत असतो. शहाळं पिऊन झाल्यावर – दादा, धन्यवाद.  शहाळ एकदम गोड होतं. असं त्यांचं अभिवादन करायला काय हरकत आहे.

मंडळी, धंदा म्हटलं की शहाळं सोलून देणं आणि आपण पैसे देणं, हे व्यवहार तर होतच असतात. पण अभिवादन केल्यामुळे समाधानाची देवाण-घेवाण पण होत असते. आणि यामुळे समोरच्याच्या चेहऱ्यावर स्मितहास्य हमखास उमटतं आणि तेच आपल्याला एक वेगळच समाधान देऊन जातं.  

आपल्या सगळ्यांच्याच रोजच्या घडामोडींमध्ये आपला नेहमीच अनेक लोकांशी संबंध येतो, ज्यांच्या सेवांचा आपल्याला उपयोग होत असतो. चांगल्या कामाबद्दल समोरच्याचं कौतुक करणं, त्यांचे आभार मानणे, ह्या गोष्टी म्हटलं तर खूपच छोट्या असतात, पण त्या आपल्या आणि समोरच्याच्या चेहऱ्यावर आनंद आणतात आणि आपल्या मनाला एक वेगळचं समाधान देत असतात.

निर्जीव वस्तूंचं कौतुक करण्यात किंवा त्यांना धन्यवाद देण्यात पण एक वेगळाच नक्की आनंद असतो. आपण रोज सकाळी झोपून उठतो, उठल्यावर बाथरूम टॉयलेट वगैरे क्रिया सुरू होतात.  पण बेड जवळ दोन मिनिट थांबून, बेडवरची चादर नीट करून / पांघरूण घडी करून, बेडला नमस्कार केला आणि म्हटलं – तुझ्यामुळे मला छान विश्रांती घेता आली, माझा कालचा दिवसभराचा थकवा पूर्ण गेला आणि आता मी आजच्या  रुटीन करता एकदम फ्रेश आहे. खूप खूप धन्यवाद.

असं केल्यावर बघा मन किती प्रसन्न होतं आणि छान समाधान मिळतं.

आपली पॉझिटिव्हिटी वाढवण्याकरता मनाचे समाधान हे उत्तम खत आहे, असं जाणकार मंडळी सांगतात.  आणि — Life without positivity is big Zero

 

© श्री सुधीर करंदीकर

मो. 9225631100 – ईमेल – srkarandikar@gmail. com

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ भारतीय विद्यार्थ्यांचा एक निर्भेळ विजय… लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती : रेखा जांबवडेकर ☆

रेखा जांबवडेकर

? इंद्रधनुष्य ?

☆ भारतीय विद्यार्थ्यांचा एक निर्भेळ विजय… लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती : सौ. रेखा जांबवडेकर 

मी अनेक वर्षे JEE भौतिकशास्त्र शिकवले आहे. तो पेपर तीन तासांत हुशार मुलांनाही थकून टाकतो.

ही परीक्षा पाच तास सिद्धांत आणि पाच तास प्रयोगशाळेतील कामाची आहे, आणि या पाच जणांनी त्यात जवळजवळ परिपूर्ण गुण मिळवले.

खरं तर काय घडलं ते मी तुम्हाला सांगतो.

आंतरराष्ट्रीय भौतिकशास्त्र ऑलिम्पियाड ही शालेय भौतिकशास्त्राची जागतिक स्पर्धा आहे. ही ५६ वी आवृत्ती होती. 

ही स्पर्धा कोलंबियातील बुकारामंगा येथे ५ ते १२ जुलै दरम्यान आयोजित करण्यात आली होती.

३८१ विद्यार्थी. ८५ हून अधिक देश. त्यातील प्रत्येक जण आपापल्या देशातील सर्वोत्तम भौतिकशास्त्राचा विद्यार्थी होता.

भारताने पाच मुलांना पाठवले होते.

… ते पाचही जण सुवर्णपदक घेऊन परत आले.

त्यांची नावे आहेत: 

पुण्याचा कनिष्क जैन. इंदूरचा रिद्धेश अनंत बेंडाळे. दिल्लीतील द्वारका येथील ऋषित गर्ग. मुंबईचा श्रेष्ठ सुरैया. अहमदाबादचा स्वरित जोशी.

आपण शंभर क्रिकेटपटूंना त्यांच्या टोपणनावाने ओळखतो, पण या मुलांपैकी एकालाही नाही.

त्या निर्भेळ विजयामुळे भारत संयुक्तपणे जागतिक क्रमवारीत पहिल्या क्रमांकावर पोहोचला. चीन, रशिया, कझाकस्तान, दक्षिण कोरिया आणि तैवान यांच्यासोबत बरोबरी साधली.

हे असे देश आहेत जे विज्ञान शिक्षणात प्रचंड पैसा आणि राष्ट्रीय अभिमान ओततात.

– – – आपण त्यांच्या बरोबरीने उभे आहोत.

आता, परीक्षा नेमकी कशी होती ते पाहूया.

दोन पेपर्स. प्रत्येक पाच तासांचा.

सैद्धांतिक पेपरमध्ये तीन प्रश्न होते.

– – एक पॅरामॅग्नेटिक कूलिंगच्या थर्मोडायनॅमिक्सवर. एक ओझोनच्या फोटोआयनायझेशनवर. एक इलेक्ट्रॉन-पॉझिट्रॉन जोड्यांच्या डायनॅमिक्सवर.

– – प्रायोगिक पेपर हा प्रयोगशाळेत आणखी पाच तासांचा होता, ज्यात द्रवांमधील उष्णता हस्तांतरण आणि थर्मोडायनॅमिक प्रक्रियांचा अभ्यास करायचा होता.

… याचा अर्थ असा की, तुम्हाला अशी उपकरणे दिली जातात जी तुम्ही कधीही पाहिलेली नसतात, आणि तुम्हाला तुमचा स्वतःचा प्रयोग तयार करावा लागतो, स्वतःची मोजमापे घ्यावी लागतात, चुका दुरुस्त कराव्या लागतात आणि अचूक उत्तरापर्यंत पोहोचावे लागते.

बहुपर्यायी प्रश्न नाहीत. कोणतेही शॉर्टकट नाहीत. पॅटर्न ओळखण्याची सोय नाही. एकतर तुम्हाला भौतिकशास्त्र समजते किंवा तुम्ही तिथे पाच तास बसून राहता.

 एचबीसीएसईच्या मते, भारतीय विद्यार्थी सिद्धांतामध्ये जवळपास परिपूर्ण आणि प्रात्यक्षिकांमध्येही उत्कृष्ट होते.

आता, आयपीएचओमधील (IPhO) भारताचा हा २७ वा सहभाग होता.

या सर्व वर्षांमध्ये, सुमारे ४४ टक्के भारतीय विद्यार्थ्यांनी सुवर्ण, ४१ टक्क्यांनी रौप्य, तर १० टक्क्यांनी कांस्य पदक जिंकले आहे.

– गेल्या दहा वर्षांत, प्रत्येक भारतीय विद्यार्थी पदक घेऊन घरी परतला आहे. ६२ टक्के सुवर्ण, ३८ टक्के रौप्य.

– गेल्या दशकात एकही विद्यार्थी रिकाम्या हाताने परत आलेला नाही.

– – एका वर्षात पाच सुवर्णपदके जिंकण्याची घटना फक्त दोनदाच घडली आहे. या वर्षी आणि २०१८ मध्ये.

तर हे कोणी उभारले?

हा कार्यक्रम *एचबीसीएसई, होमी भाभा विज्ञान शिक्षण केंद्र* द्वारे चालवला जातो. हे टीआयएफआरच्या (TIFR) अंतर्गत येते, जे अणुऊर्जा विभागाच्या अखत्यारीत येते.

ते संपूर्ण प्रक्रिया चालवतात.

– एक राष्ट्रीय परीक्षा, त्यानंतर एक राष्ट्रीय ऑलिम्पियाड, मग एक कठोर निवड आणि प्रशिक्षण शिबिर, आणि देशातील प्रत्येकातून, पाच मुले विमानात बसतात.

– या टीमचे नेतृत्व एचबीसीएसई-टीआयएफआरचे प्राध्यापक अन्वेश मजूमदार आणि मुंबईच्या सेंट झेवियर्स कॉलेजच्या डॉ. लीना जोशी यांनी केले.

– वैज्ञानिक निरीक्षकांमध्ये आयआयएसईआर कोलकाताचे प्राध्यापक आनंद दासगुप्ता आणि *रत्नागिरीतील गोगटे-जोगळेकर कॉलेजच्या निशा केळकर* यांचा समावेश होता.

होय. रत्नागिरी. महाराष्ट्रातील एका किनारपट्टीच्या शहरातील महाविद्यालय. 

हे सार्वजनिक शिक्षण असे काहीतरी करत आहे, जे खाजगी कोचिंग इंडस्ट्री स्वतःच्या बळावर कधीच करू शकली नसती.

कोचिंग इंडस्ट्री एका गोष्टीत खूप चांगली आहे. तुम्हाला एखादी ज्ञात समस्या वेगाने सोडवायला शिकवणे.

जेईई आणि नीट याच गोष्टीला पुरस्कृत करतात, आणि मी हे प्रेमाने म्हणत आहे कारण मी त्या जगाचा एक भाग होतो.

पण ऑलिम्पियाडच्या प्रश्नपत्रिकेचा कोणताही ज्ञात प्रकार नसतो.

तिथे शॉर्टकटचा कोणताही धडा नसतो. तुम्हाला वाचवणारी कोणतीही सूत्रपत्रिका नसते.

तुम्हाला कधीही न पाहिलेल्या समस्येसोबत बसावे लागते आणि विचार करावा लागतो.

तो एक पूर्णपणे वेगळाच स्नायू आहे.

– – – आणि एक सरकारी अनुदानित केंद्र गेल्या २७ वर्षांपासून भारतीय किशोरवयीन मुलामुलींमध्ये ही प्रतिभा शांतपणे घडवत आहे.

तर हो, अभिमान बाळगा. तोही मोठ्याने.

एचबीसीएसईने (HBCSE) हेही सांगितले की, भारतातील सुमारे ६४ टक्के ऑलिम्पियाड पदक विजेते पुढे पीएचडी करतात. पण केवळ ३२ टक्के पदक विजेतेच भारतात स्थायिक होतात.

… मी हे क्षण खराब करण्यासाठी सांगत नाहीये.

या मुलांचे देशावर काहीही देणे लागत नाही.

त्यांना मिळालेला प्रत्येक पर्याय त्यांनी स्वतःच्या मेहनतीने मिळवला आहे.

… पण यातून आपल्याला एक गोष्ट कळायला हवी. ही प्रतिभा शोधण्यात आपण उत्कृष्ट आहोत.

तिला प्रशिक्षण देण्यात आपण उत्कृष्ट आहोत. पण तिला राहण्यायोग्य जागा देण्यात आपण अजूनही तितके चांगले नाही.

अभिनंदन कनिष्क, रिद्धेश, ऋषित, श्रेष्ठ आणि स्वरित.

… या वर्षी एका भारतीयाने केलेल्या सर्वोत्तम गोष्टींपैकी ही एक आहे आणि देशातील बहुतांश लोकांना याबद्दल कधीच कळणार नाही.

लेखक : अज्ञात 

(भौतिकशास्त्र ऑलिम्पियाडमध्ये सुवर्णपदक जिंकलेल्या भारतीय विद्यार्थ्यांच्या एका शिक्षकाकडून आलेला संदेश) 

प्रस्तुती : रेखा जांबवडेकर

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ ‘गुरुपौर्णिमा’ ☆ श्री दिवाकर बुरसे ☆

श्री दिवाकर बुरसे

🌸 विविधा 🌸

☆ ‘गुरुपौर्णिमा’ ☆ श्री दिवाकर बुरसे

आषाढ पौणिमा, म्हणजे – गुरुपौर्णिमा

त्या निमित्त ही अक्षर गुरुवंदना !

“श्री गुरवे नमः”

आजच्या गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने…

प्रास्ताविक

आषाढ पौर्णिमा म्हणजे व्यास पौर्णिमा म्हणजेच गुरु पौर्णिमा. आपल्या गुरुंचे/गुरुतत्वाचे पुण्यस्मरण करण्याचा, गुरुविषयी कृतज्ञता व्यक्त करून गुरुदक्षिणा अर्पण करण्याचा दिवस.

गुरु कोण?

आपल्याला जो  शिकवतो, ज्ञान देतो तो आपला गुरु. गुरु देहधारी असू शकतो किंवा विदेही असू शकतो. येवढेच काय पण गुरु मानवेतर प्राणी, पशु, पक्षी, कीटक, वनस्पती, वस्तू, धातू काहीही असू शकतो. साक्षात श्री गुरुदेव दत्तात्रेयांनी स्वतः चोवीस गुरु केले होते हे सर्वश्रुत आहे. न्यूटनला झाडावरून पडणाऱ्या सफरचंदाने ज्ञान दिले. ते फळ त्याचा गुरु म्हणता येईल. अशी अनेक उदाहरणे सांगता येतील.

माणूस जन्मापासून मरेपर्यंतच्या आपल्या जीवनयात्रेत पदोपदी, क्षणोक्षणी, कळत नकळत काही तरी शिकत असतो, ज्ञान मिळवत असतो. तो ते ज्ञान कुणाकडूनही घेत असतो. म्हणूनच म्हणावेसे वाटते की जो आपल्याला काही शिकवतो तो गुरुच. गुरु हे एक तत्व आहे असे म्हणणे अधिक योग्य ठरेल.

सद्गुरु कोण?

समर्थ म्हणतात, जाणावे आपणासी आपण, या म्हणती ज्ञान (Absolute knowledge) या शुद्ध ज्ञानाव्यतिरिक्त मिळालेली सगळी केवळ माहिती (Information). असे शुद्ध, विमलज्ञान (Absolute knowledge) देणारा तो ‘सद्गुरु’. सद्वस्तु दाखवि तो सद्गुरु अशी सद्गुरु या शब्दाची सोपी व्याख्या समर्थांनीच केली आहे.

अध्यात्मक्षेत्रात  सद्गुरुला सर्वोच्च मानले आहे. सद्गुरु म्हणजे ब्रह्मा, सद्गुरु म्हणजे विष्णू, सद्गुरु म्हणजेच महेश्वर. सद्गुरु म्हणजे साक्षात परब्रह्म. ज्याने हे चर-अचर, खंडित न होणारे वलयाकार मंडळ व्यापले आहे, असे ब्रह्मपद दाखविणाऱा सद्गुरु. जो चैतन्यस्वरूप, शाश्वत, शांत, आकाशादिपेक्षा सूक्ष्म, निरंजन, नादातीत, बिंदुतीत, कलातीत आहे असा सद्गुरु. सद्गुरु हाच वेदांत, सद्गुरु हाच सिद्धांत आणि सद्गुरु हाच धादांत!

भारतीय अध्यात्म परंपरेत सद्गुरु हाच एकमेव मोक्षदाता आहे असे मानतात. सद्गुरुची महती सांगताना कबीरजी महाराज आपल्या एका दोह्यात म्हणतात,

गुरु गोविंत दोऊ खडे, काके लागू पाय

बलिहारी गुरु आपने, गोविंद दिये बताय।

साक्षात ईश्वर आणि सद्गुरु दोघेही समोर उभे ठाकले तर प्रथम सद्गुरुचे पाय धरावे नंतर गोविंदाचे. कारण सद्गुरुमुळे तर गोविंद लाभले आहेत! येवढे सद्गुरूचे महत्व आहे.

माणसाला सायुज्यमुक्तिदाता  सद्गुरु केवळ त्याच्या  पूर्वपुण्याईमुळेच मिळू शकतो. पण सध्याच्या काळात अशा योग्यतेचा सद्गुरु लाभणे कठीणच आहे.

परब्रह्म प्राप्ती, आत्मज्ञान प्राप्ती सद्गुरुविनाही होऊ शकते असे मानणारे थोर तत्वचिंतक जे. कृष्णमूर्तींसारखे काही मान्यवर आहेत त्यांचाही इथे उल्लेख करायला हवा.

सद्यस्थिति – गुरुहाट

सध्या अध्यात्म हा व्यवसाय, व्यापार होऊन बसलाय! समाजकारण,  राजकारण, नेतेगिरी, भाईगिरी, तशी अध्यात्मगिरी झालीय. देशाविदेशात अनेक गुरु, सद्गुरु, परात्पर गुरु, गुरुमाँ, बुवा, बाबा, बापू, श्री, श्री श्री, श्री श्री श्री आपापले मठ, पीठे, आश्रम, गाद्या, गद्द्या, तख्ते, डेरे, दमदमे, दरबार,आखाडे उघडून बसले आहेत. तिथून जगभर पसरलेल्या भक्तांना सामुदायिक दीक्षा, मंत्रदीक्षा, अनुग्रह, शक्तिपात दीक्षा, आँनलाईन दीक्षा आणि अनुग्रह घाऊक प्रमाणात दिले जातात. काहींना एकांतदीक्षा, अंगसंगदीक्षाही देण्याची व्यवस्था असते. हे मठ, पीठे, आश्रम, गाद्या, गद्द्या, दरबार इ. सर्व सुखसोयींनी युक्त असतात. मठाधिपती गुरु राजाश्वैर्य भोगत असतात. गुरुदेवांना स्वतःची झेड प्लस सुरक्षा असते. गुरुदेवांभोवती भक्त-भक्तिणींचे गराडे पडलेले दिसतात. गुरुदेवांच्या चरणी भक्त आपल्या निष्ठा, श्रद्धा, भक्तीबरोबर धनकोष व खिसेही रिकामे करतात. गुरु शेकडो हजारो कोटींचे स्वामी होतात पण भक्त बिचारे मात्र नंतर काही दिवसात  पस्तावतातही! याला अपवाद असू शकतील पण तरीही सामान्यांनी या पासून दूर रहावे हेच हिताचे. असो.

ग्रंथ हेच गुरु.

म्हणून मला वाटते की सध्याच्या विज्ञान युगात या गुरु, बुवा, बापूंच्या नादी न लागता माणसाने ग्रंथ हेच गुरु आणि त्यांचे वाचन हीच उपासना मानावी.

वाचनाला पर्याय नाही. विविध समाजमाध्यमे, आंतरजाल, गुगल, विकिपिडिया हे ही सध्याचे शक्तिशाली गुरुच आहेत. सूज्ञाने त्यांच्या भजनी लागून आपला उद्धार आपणच करावा.

ग्रंथमहात्म्य

‘ग्रंथदासा’च्या शब्दातच ऐका ग्रंथमहात्म्य

या साऱ्यांची (ग्रंथकारांची) कैक चिंतने। शिक्षणे, शिकवणे, निरीक्षणे। सिद्धांत, मते, अनुमाने। आपापल्या शास्त्राविषयी।।१२।।

त्यांचेच हे उपकार। लिहिले ग्रंथसंभार। ज्ञानाचे भरले भांडार। ग्रंथगर्भी।।१३।।

हे थोरांच्या अनुभवांचे बोल। साधके अभ्यासावे सखोल। जाणून विद्यार्जनाचे मोल। जन्म सार्थकी लावावा।।१४।।

ग्रंथ ज्ञानमार्गीचे वारू। ग्रंथ दवडिती अज्ञान तिमिरू। की भवसागराचे तारू। पैल लाविती।।१५।।

ग्रंथ हेचि गुरु। ग्रंथ परम उपकारू।त्यांना माझा नमस्कारू।अत्यादरे।।१६।।

ग्रंथांविषयी अनादरू। करिता हानि अपरंपारू।हे सत्य मनी धरू। स्वहिताकारणे।।१७।।

नाना विषयांचे नाना ग्रंथ। नाना भाषेतील नाना ग्रंथ। नाना कला शास्त्रांचे अद्भुत ग्रंथ। टीका, कोष, उपदेश।।१८।।

सकळ ग्रंथांविषयी आदरू। धरून मनी अपारू।धुंडाळावे ग्रंथांतरू। नित्य नेमे।।१९।।

नाना ग्रंथ वाचावे। सार शोधून घ्यावे। असार ते त्यजावे। हे विहित क्रिया।।२०।।

(ग्रंथदासविरचित ‘ग्रंथसंग्रह निगराणी प्रकरण’)

वाचन हीच उपासना. वाचनाचे महत्व आणि लाभ ग्रंथदास आपल्या ‘वाचनक्रिया निरूपण प्रकरणा’त लिहितो….

वाचन, चिंतन, मनन। मंथन आणि निधिध्यासन। हेचि साधकाचे लक्षण। यास उपाय नाही।।३६।।

जयास वाटे थोर व्हावे। त्याने अखंड वाचावे।वाचता वाचता जाड व्हावे।  गगनासारिखे।।३७।।

आता ऐका वाचनाचे लाभ। गळती बुद्धीचे मळभ। मार्ग सापडे सुलभ।ज्ञान मंदिराचा।।३८।।

वाचने संशय फिटती। वाचने आशंका आटती।वाचने क्षितिजे रुंदावती। जाणिवांची।।३९।।

वाचने विषय समजती। वाचने रहस्ये उकलती।  वाचने धोके टळती। अधोगतीचे ।।४०।।

वाचने लौकीक वाढे। वाचने लोकसंग्रह घडे। संतसमागम घडे। लाभे व्युत्पन्नता।।४१।।

वाचने कळे सभ्यता। अंगी येई विनम्रता। वाचने लोकप्रीयता। वाढीस लागे।।४२।।

ऐसे सारेच लाभते। भक्ती-ज्ञान-वैराग्य चढते।सार-असार कळो येते। चित्ता ये प्रसन्नता ।।४३।।

वाचने प्रज्ञा वाढे। वाचने अज्ञान झडे। वाचने वाचती वेढे। जन्म मृत्यूचे।।४४।।

वाचाल तरी वाचाल। नाही तर मराल। न करावा अन्य सवाल। या ऊपरी।।४५।।

(“ग्रंथदास”विरचित “वाचनक्रीया निरूपण प्रकरण”)

समारोप

आम्हाला ज्यांनी जन्मभर शिकवले, समजावले, शहाणे केले त्या सर्वांविषयी आपण कृतज्ञ असायला हवे. ज्या वेळी मातेच्या उदरातून आपण या जगात आलो त्यावेळी होतो केवळ एक जिवंत त्वचा-अस्थि-मांसाचा पिंड! त्यावेळी आपल्याला अस्तित्व प्राप्त झाले होते खरे, पण व्यक्तिमत्व प्राप्त व्हायचे होते. त्या व्यक्तिमत्वहीन अस्थित्वचामांसपिंडावर जन्मल्या क्षणापासून पुढे क्षणोक्षणी कोणी ना कोणी काही ना काही संस्कार केले आणि त्या पिंडाला आकार देत राहिले. आज आपण जे आहोत, आपले जे व्यक्तिमत्व घडले आहे, जे जगाला दिसते आहे त्यामागे अनंत अज्ञात हात आहेत. ते हात या साऱ्या  ज्ञात अज्ञात गुरुंचे आहेत.

त्यात सर्वाधिक वाटा आहे असंख्य ग्रंथांचा आणि ग्रंथकर्त्यांचा. तेही सगळेच आपले गुरु आहेत हे नाकारता येत नाही. अशा सर्व ज्ञात अज्ञात गुरुंचे, ग्रंथकर्त्यांचे ऋण मान्य करून त्यांचे आभार मानणे, त्यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त करणे आपले कर्तव्य आहे. म्हणूनच आजच्या गुरुपौर्णिमेच्या दिनी त्या सर्व गुरुजनांना आणि त्या मागील महद्गुरुतत्वाला माझा साष्टांग दंडवत! तस्मै श्री गुरवे नमः!!

🙏🏻🙏🏻🙏🏻

© श्री दिवाकर बुरसे

पुणे

संपर्कः ९२८४३००१२५, ९५५२६२९२४५

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ “माझी वारी ! माझा अनुभव !”- लेख क्र. ६ ☆ श्री संभाजी बबन गायके ☆

श्री संभाजी बबन गायके

??

माझी वारी ! माझा अनुभव ! – लेख क्र. ६ ☆ श्री संभाजी बबन गायके 

मरणाचा सोहळा आणि सोहळ्यातील मरण!

काही परंपरा परिस्थितीनुरूप तयार होतात आणि जोवर परिस्थिती बदलत नाही, तोवर टिकून राहतात. देहू-आळंदी ते पंढरपूर हे अंतर किलोमीटर्सच्या भाषेत सुमारे २५० किलोमीटर्स एवढे आहे. श्री संत गजानन महाराज पालखी शेगाव ते पंढरपूर हे अंतर येताना सुमारे ७५० किलोमीटर्स अंतर कापते… तर येताना मार्ग वेगळा असल्याने ५५० किलोमीटर्स चालावे लागते. कोथळी जिल्हा जळगाव येथून मुक्ताबाई तर थेट जाऊन येऊन थेट सुमारे १५०० किलोमीटर्स अंतर चालतात. पैठण ते पंढरपूर सुमारे ३५० किलोमीटर्स भरते.

देहू-आळंदी, पैठण, मुक्ताईनगर, शेगाव इत्यादी ठिकाणाहून पालखीसोबत पंढरीस येणारे बरेचसे वारकरी आषाढी एकादशीनंतर दुस-या दिवशी वाहनांनी घरी परततात. काही मोजके वारकरी पालखी सोबत चालत माघारी जातात… त्याला परतवारी म्हणतात. आणि परत येतानाचा आव्हानात्मक निम्म्याच दिवसांत प्रवास उरकला जातो!

पूर्वी आजच्या इतके रस्ते विकसित नव्हते. बैलगाडी हे वाहन वारीसोबत नेता यायचे. क्वचित घोडागाडी सुद्धा. पण स्वयंचलित वाहनांची सोय नव्हती. वारी काळात पावसाची सोबत असली तरी हवामानानुसार ऊनही असते कित्येकवेळा. दिवसभराची पायी वाटचाल, त्यामानाने लाभणारी कमी विश्रांती, जेवणाच्या वेळांतील, पदार्थातील बदल, पाणी बदलल्यामुळे, दुषित हवामानामुळे काही वारकरी लोकांची प्रकृती बिघडण्याची शक्यता असतेच. जुन्या काळी तर अनेक आरोग्य समस्यांना वारकरी तोंड देत असत.

लाखो लोक सहभागी असलेल्या वारीदरम्यान वारकरी मृत होण्याचे प्रकार घडणे साहजिकच असे. अशावेळी मृतदेह त्या व्यक्तीच्या मूळगावी घेऊन जाणे अशक्यप्राय होत असे. दळणवळणाची, संपर्क साधने फारशी उपलब्ध नसल्याने मृताच्या नातेवाईकांना त्या ठिकाणी बोलावून घेणे वेळेच्या कमतरतेमुळे व्यावहारिक ठरत नसे. मग अशा प्रसंगी ज्या ठिकाणी वारकरी मयत झालेला असेल त्याच ठिकाणी त्याच्यावर अंत्यसंस्कार केला जाई. तोवर पालखी सोहळा थांबून राही. टाळ-मृदुंगाच्या आणि अभंगांच्या साथीने अंत्यसंस्कार केले जात. आणि मगच सोहळा मार्गस्थ होई!

भक्तिभाव असल्याने वारीच्या मार्गावर एखाद्यास मृत्यू आला तर ती व्यक्ती दैववान होती, त्याला नामस्मरण करता करता देवाने त्याच्याकडे बोलावून घेतले, अशी लोकभावना होती.

हल्ली वारीत वैद्यकीय उपचार, रुग्णवाहिका मोठ्या प्रमाणात उपलब्ध असतात. वाहनांची उत्तम सोय असते. त्यामुळे असा काही प्रसंग उद्भवला तर मृतदेह त्या व्यक्तीच्या गावी पाठवणे शक्य झाले आहे.

एका वारीच्या प्रवासात माझे ज्येष्ठ स्नेही श्री. संभाजी वाघेरे यांना मुतखड्याचा आत्यंतिक त्रास होऊ लागला. आम्ही नेमके वाखरीवरून पुढे निघण्याच्या गडबडीत होतो. त्या प्रचंड गर्दीतही एक डॉक्टर उपलब्ध झाले. त्यांनी प्रथमोपचार केले परंतू रुग्णाला दुखणे असह्य होत असल्याचे पाहून त्याला रुग्णवाहिकेतून पंढरपूरला पाठवण्याचा निर्णय घेतला गेला. आणि रूग्णाला सोबत म्हणून मी ही त्या रुग्णवाहिकेतून निघालो. लाखो लोकांचा समुदाय लगबगीने पुढे निघालेला होता… पण रुग्णवाहिका पाहताच वाट करून दिली जाई… काळजीपोटी वारकरी आत डोकावून पहात… आणि या माणसाला लवकर बरं वाटू दे… अशी विठ्ठलास प्रार्थना करीत… पंढरीस पोहोचल्यावर शासकीय रुग्णालयात योग्य ते उपचार मिळाले. मात्र रात्री पुन्हा त्रास होऊ लागल्याने एका खाजगी डॉक्टरांकडून औषधे घ्यावी लागली.

आम्ही खरं तर औषधोपचार झाल्यानंतर पंढरीत जाऊन आमच्या मुक्कामाच्या जागी पोहोचणार होतो. पण नेमकी त्याचवेळी माझी तब्येत खूप बिघडल्याने मलाही काही सुचत नव्हते. मीही औषधे घेतली. जिथे आम्ही दवाखान्यात गेलो होतो तिथून आमची मुक्कामाची जागा खूपच दूर होती… गर्दीत चालणे अवघड होते. म्हणून आम्ही मंदिराजवळच्या एका धर्मशाळेत रात्रीचा मुक्काम करण्याचा निर्णय घेतला. पण इकडे दिंडीत खूपच गोंधळ उडाला होता. दुपारी निघालेलो आम्ही दोघे… आमचा आणि त्यांचा संपर्क होऊच शकला नाही. कारण त्यावेळी मोबाईल नव्हते. आम्ही शासकीय रुग्णालयात गेलो तर होतो पण तिथून आमचे आम्ही दुस-या दवाखान्यात गेलो होतो. शासकीय रुग्णालयात खूप गर्दी असल्याने आम्ही कुणाला काही निरोपही देऊ शकलो नाही. त्यामुळे आमची दिंडी आणि आम्ही एकमेकांपासून दुरावलो होतो. दिंडीतील कारभारी लोकांनी विविध माध्यमातून आमचा शोध घेत होते. वारीसोबत असलेल्या पोलिसांची मदत घेण्यात आली. त्यांनी रुग्णालयात आमचा शोध घेतला खरा… पण आम्ही तिथे नव्हतोच. सर्वजण अत्यंत काळजीत पडले… रात्र झाली होती… लाखो लोक पंढरीत पोहोचत होते. ठिकठीकाणी तंबू पडलेले होतेच.

रात्रीचे दहा-साडेदहा वाजले होते. संभाजीरावांना आता थोडे बरे वाटू लागले… वेदना कमी झाल्या होत्या. मग आम्ही मुक्कामाची जागा शोधण्याचा प्रयत्न केला… पांडुरंगाची प्रार्थना केली… गर्दीतून कशीबशी वाट काढीत, पत्ता विचारीत विचारीत चालू लागलो… आणि काहीच वेळात आमची माणसं दृष्टीस पडली… सर्वांचाच जीव भांड्यात पडला… पण आधी लोक मला खूप रागावले… पण मीही आजारी पडल्याचे समजल्यावर सर्वांनी मग माझीही आपुलकीने चौकशी केली… जेवू घातले… आणि आमची आरामदायक जागेत सोय केली… बारा वाजले होते… एकादशी सुरु झाली होती… तंबूत भजनी जागर सुरु झाला होता… कुणी आजोबा गात होते… जाऊ देवाचिया गावा… देव देईल विसावा! वारीचे दिवस छान होते…! छान असतात! रामकृष्णहरी!

– लेख क्र. ६  

© श्री संभाजी बबन गायके 

पुणे

9881298260

≈ संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ “व्हाट्सअप गॉसिप” ☆ श्री मंगेश मधुकर ☆

श्री मंगेश मधुकर

? मनमंजुषेतून ?

☆ “व्हाट्सअप गॉसिप…” ☆ श्री मंगेश मधुकर

झालं असं की,

कामं आटपल्यावर दुपारी मीनानं प्रियाला फोन केला.

“शंभर वर्ष आयुष्ययं. तुलाच फोन करणार होते.” प्रिया.

“सेम टू यू. सुलभाचं कळलं का” मीना 

“ग्रुपमधून बाहेर पडली ते ना”

“हो”

“नेहमीचचं झालयं. जरा मनाविरुद्ध झालं की ही चालली ग्रुप सोडून…”

“फार अहंकारी आहे. स्वतःची मर्जी चालवायला बघते.” मीना.

“घरचे किंमत देत नाहीत म्हणून तर ग्रुपवर नाचत असते. स्वतःचा उदो उदो करून घेते.”

“कायम मोठ मोठया बाता मारत असते. तिच्या पोस्टला कमेंट केलं नाही तर राग येतो. ”मीना.

“स्वतः वाट्टेल ते मेसेज करणार पण इतरांनी कोणते मेसेजेस टाकायचे आणि कोणते नाही हे ही ठरवणार.”

“काही नाही गं. मीच कशी शहाणी दाखवण्याचा प्रयत्न”मीना.

“तसंही सुलभाला लपून छपून मोठेपणा दाखवण्याची सवयच आहे.”

“लक्ष द्यायचं नाही. क्लियर ऑल करायचं” 

“सगळेच आपल्यासारखं गप्प बसणारे नसतात म्हणून तर काल कालिंदीनं ऐकलं नाही. पोस्ट डिलिट न करता आपला मुद्दा रेटत राहिली. ”मीना.

“तेच सुलभाला झोंबलं. मेसेज डिलिट करायला सांगितल्यावर लगेच विनीतानं सपोर्ट केला.”

“ते नेहमीचचं आहे. त्यांच गुळपीठ नेहमीच जमतं”मीना.

“तु मला ओवाळ अन मी तुला ओवाळते असं म्हणत ग्रुपवर कौतुक सोहळा चालू असतो. ते पाहून बऱ्याचदा हसू येतं आणि असह्य होतं असं वाटतं की.. ”

“ग्रुपमधल्या अनेकांना तसंच वाटतं. फालतूचे वाद आणि बावळटांच्या नादी लागण्या पेक्षा शांत बसणं चांगलं!!” मीना.

“जाऊ दे ना. आपल्याला काय करायचं. आपण गंमत बघायची.”

“ए ग्रुप बघितला का? सुलभाला परत ऍड केलं” मीना.

“विनीतानं केलं असणार”

“दुसरं कोण!!”

“सुलभाचा मेसेज बघितला का?”

“हो,काय तर म्हणे!! आपली मैत्री जुनी आहे. प्रत्येकाचे स्वभाव,विचार करायची पद्धत वेगवेगळी आहे तेव्हा एकमेकांना जज करण्यापेक्षा रिस्पेक्ट करू. कमेंट करण्याआधी विचार करा”

“त्यावर विनीतानं लगेच रिप्लायही दिला ‘खूप छान विचार!! सगळ्यांच्या फायदा होईल. धन्यवाद सुलभा.!”

“सुरवात स्वतःपासून कर,सुलभा” हा कालिंदीचा मेसेज म्हणजे सिक्सर.”

“हो पण या सिक्सरनं ग्रुपवर नवीन वाद सुरु झाला”

होऊ दे. आपल्याला फुल टाइमपास…” मीना-प्रिया दोघीही मोठमोठ्यांनं हसायला लागल्या..

—– 

वरील संभाषण काल्पनिक असलं तरी त्याला वास्तवाचा आधार आहे.

“व्हॉटसप ग्रुप” हे आता जगण्याचा भाग झालेत. ग्रुपवरच्या पोस्ट,चर्चा मेसेजेस,वाद आणि गॉसिप याचसुद्धा रुटीन झालंय मीना-प्रिया यांच्याप्रमाणेच “दुसऱ्यांचं ग्रुपवरचं वागणं” हाच विषय प्रामुख्यानं असतो.

“व्हॉटसप गॉसिप” चा संसर्ग सगळ्यांनाच झालाय. एवढं मात्र नक्की..

 

© श्री मंगेश मधुकर

मो. 98228 50034

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ ज्ञानसूर्य महर्षी वेदव्यास… ☆ विभावरी कुलकर्णी ☆

विभावरी कुलकर्णी

🌈 इंद्रधनुष्य 🌈

☆ ज्ञानसूर्य महर्षी वेदव्यास… ☆ विभावरी कुलकर्णी ☆

* ज्ञानसूर्य महर्षी वेदव्यास *

         – – – एका अलौकिक जीवनप्रवासाची कथा ! 

१. तपोवनातील बालपणीचा ध्यास

गंगा आणि यमुनेच्या पवित्र संगमाजवळील एका शांत, नयनरम्य बेटावर एका तेजस्वी बालकाचा जन्म झाला. पिता पराशर ऋषींचे अगाध ज्ञान आणि माता सत्यवतीची अलौकिक माया यांच्या छायेत हे बालक लहानाचे मोठे होऊ लागले. बेटावर (द्विपावर) जन्म झाल्यामुळे आणि अंगावर सावळ्या (कृष्ण) रंगाची सुंदर झाक असल्यामुळे माता-पिता त्यांना प्रेमाने ‘कृष्णद्वैपायन’ असे म्हणत. तर पराशर ऋषींचे पुत्र म्हणून त्यांना समाज ‘पाराशर्य’ या नावानेही ओळखू लागला.

बालपणापासूनच कृष्णद्वैपायन यांच्या मनात संसाराच्या ऐहिक सुखांपेक्षा अध्यात्माची, परम सत्याची आणि ज्ञानसाधनेची ओढ तीव्र होती. वयाच्या अगदी छोट्या टप्प्यावर त्यांनी मातेकडे जाऊन वनात तपश्चर्चेसाठी जाण्याची अनुमती मागितली. मातेचा आशीर्वाद घेऊन त्यांनी घोर अरण्यात प्रवेश केला. तेथे त्यांनी अत्यंत कठोर ज्ञानसाधना व तपश्चर्या केली. या तपाच्या तेजाने त्यांना संस्कृत भाषेचे संपूर्ण मर्म, सृष्टीचे गूढ नियम आणि अलौकिक ज्ञानाची प्राप्ती झाली.

२. वेदविभागणीचा महान यज्ञ

त्या काळात मानवी समाजाकडे ज्ञानाचा अथांग साठा होता, पण तो सर्व ‘वेद’ नावाच्या एकाच विशाल राशीमध्ये एकत्र गुंफलेला होता. काळ बदलत होता, मानवी बुद्धी आणि स्मरणशक्ती मर्यादांमध्ये बांधली जात होती. एकच विशाल वेद पाठ करणे किंवा समजून घेणे सामान्य माणसालाच नव्हे, तर विद्वानांनाही कठीण जाऊ लागले होते.

हे पाहून कृष्णद्वैपायनांनी ज्ञानाच्या त्या अथांग सागराचे सुलभ आणि पद्धतशीर वर्गीकरण करायचे ठरवले. त्यांनी एका वर्तुळातील व्यासाप्रमाणे (Diameter) ज्ञानचक्राच्या दोन्ही टोकांना जोडणारे आणि निसर्गाच्या ‘प्रवृत्ती’ व ‘निवृत्ती’ या दोन्ही मार्गांचे सखोल विश्लेषण करणारे महान कार्य हाती घेतले. ज्ञानाचे स्पष्टीकरण (विशद) करून वेदांचे सुटसुटीत भाग पाडले, म्हणूनच जगाने त्यांना आदराने ‘व्यास’ ही पदवी दिली.

व्यासांनी ज्ञानराशीचे चार मुख्य भाग केले:

ऋग्वेद: त्यांनी सर्व ऋचा (छंदोबद्ध मंत) एकत्र करून ज्या स्तवनांचे पठण केले जाऊ शकते, त्यांचा ‘ऋग्वेद’ तयार केला.

सामवेद: ज्या ऋचांचे मधुर गायन करता येते, त्यांना संगीतमय ‘सामवेदात’ ग्रथित केले.

यजुर्वेद: यज्ञ-याग, कर्मकांड आणि विधींचे तपशीलवार वर्णन करणाऱ्या गद्य मंत्रांना ‘यजुर्वेद’ हे नाव दिले.

अथर्ववेद: मानवी जीवनातील लौकिक व्यवहार, औषधी, आणि दैनंदिन रक्षणासाठी लागणाऱ्या मंत्रांचे संकलन करून ‘अथर्ववेद’ रचला.

– – त्या काळातील सर्व श्रेष्ठ आचार्य आणि विद्वानांनी व्यासांच्या या अद्वितीय आणि वैज्ञानिक वर्गीकरणाला नतमस्तक होऊन मान्यता दिली.

३. महाभारत, पुराणे आणि ब्रह्मसूत्रांची निर्मिती

वेदांचे ज्ञान अत्यंत गूढ आणि क्लिष्ट होते. ते अगदी शेवटच्या घटकापर्यंत, सामान्यातील सामान्य माणसापर्यंत कसे पोहोचवायचे? या प्रश्नाचे उत्तर म्हणून व्यासांनी कथा आणि इतिहासाचे माध्यम निवडले.

त्यांनी ‘महाभारत’ या महाकाव्याची रचना केली. पांडव आणि कौरव यांच्या संघर्षाच्या कथेतून त्यांनी मानवी जीवनातील धर्म-अधर्म, सत्य-असत्य आणि चांगले-वाईट यातील सूक्ष्म भेद स्पष्ट केले. महाभारताच्या रूपात त्यांनी मानवी स्वभावाचा आणि जीवनमूल्यांचा एक भव्य आरसाच जगासमोर ठेवला.

त्यानंतरही त्यांचे ज्ञानसत्र थांबले नाही. त्यांनी अठरा महापुराणांची रचना केली, ज्यामध्ये ‘भागवत पुराण’ हे भक्तीचा आणि ज्ञानाचा शिरोमणी ग्रंथ ठरला. या पुराणांमध्ये त्यांनी सृष्टीच्या नियमांचे खालील ५ मुख्य भागांत वर्गीकरण करून रंजक कथांद्वारे ज्ञान दिले:

१. सर्ग: जगाची, निसर्गाची मूळ निर्मिती.

२. प्रतिसर्ग: प्रलयानंतर होणारी पुर्नरचना किंवा प्रलय.

३. मन्वंतर: काळाचे मोठे कालखंड आणि त्यातील जीवनमान.

४. वंश: देव, ऋषी आणि राजांची वंशावळ.

५. वंशानुरचित: त्या महान राजांचे आणि पुरुषांचे चरित्र.

याशिवाय उपनिषदांमधील परम सत्याचा गूढ अर्थ उलगडून दाखवण्यासाठी त्यांनी **’ब्रह्मसूत्रां’**ची रचना केली, ज्याने भारतीय तत्त्वज्ञानाला एक भक्कम वैचारिक पाया दिला.

४. गुरुपौर्णिमा आणि व्यासांचे अमर स्थान

व्यासांनी जगातील अशा कोणत्याही विषयाला सोडले नाही, ज्याचे विवरण त्यांनी आपल्या ग्रंथांमध्ये केले नाही. म्हणूनच “व्यासोच्छिष्टं जगत्सर्वम्” (म्हणजेच जगतातील सर्व ज्ञान हे व्यासांचे उष्टे आहे/व्यासांनी आधीच स्पर्श केलेले आहे) अशी म्हण रूढ झाली.

ज्या दिवशी महर्षी व्यासांचा जन्म झाला, तो आषाढ पौर्णिमेचा दिवस! आपल्या संस्कृतीने या महान ज्ञानसूर्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी हा दिवस ‘गुरुपौर्णिमा’ किंवा ‘व्यासपौर्णिमा’ म्हणून साजरा करण्यास सुरुवात केली. जगतगुरू म्हणून महर्षी व्यास हे केवळ भूतकाळात होऊन गेलेले ऋषी नाहीत, तर ते आपल्या अवतीभवती विचारांच्या, ज्ञानाच्या आणि संस्कृतीच्या रूपात सदैव जिवंत आहेत.

आपली संपूर्ण भारतीय संस्कृती, आपली विचारसरणी आणि आमचे जीवनमूल्य हे व्यासांच्या महाभारत आणि पुराणांवर आधारित आहे. भारतीय संस्कृतीचे मूळ समजून घ्यायचे असेल, तर व्यासांच्या साहित्याचा अभ्यास करणे अपरिहार्य आहे. अशा या महान, दिव्योदात्त, परम विद्वान आणि सर्वश्रेष्ठ साहित्यकाराचा जन्म आपल्या भारतभूमीत झाला, हा आपल्यासाठी अनंत काळापर्यंत अभिमानाचा विषय आहे. 

गुरुपौर्णिमेच्या पावन पर्वावर या आद्यगुरु महर्षी वेदव्यास यांच्या चरणी शतशः प्रणाम!

©  विभावरी कुलकर्णी

सांगवी, पुणे

मोबाईल नंबर – ८०८७८१०१९७

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares