श्री अनिल वामोरकर
📖 वाचताना वेचलेले 📖
☆ “पती-पत्नी : आयुष्याचे शेवटचे सोबती” – लेखक – अज्ञात ☆ प्रस्तुती – श्री अनिल वामोरकर ☆
लग्न म्हणजे फक्त फोटोमध्ये हसणाऱ्या दोन चेहऱ्यांची गोष्ट नाही. ती एका घरात राहणाऱ्या दोन व्यक्तींची कहाणी आहे, ज्या हजारो वेळा तुटतात, पण जगाला न कळता पुन्हा स्वतःला जोडून घेतात.
पती-पत्नीच्या नात्यात फक्त प्रेमच नसते. त्यात राग असतो, अहंकार असतो, दुःख असते. असेही दिवस येतात की दोघेही एकमेकांशी बोलत नाहीत. पत्नीच्या मनात वेदना असते की, “हे कधीच बदलणार नाहीत. ” तर पतीच्या मनात खंत असते की, “ही मला कधीच समजून घेत नाही. ”
पण गंमत बघा…
तोच पती उशिरा घरी आला की पत्नी दाराच्या आवाजाने जागी होते. आणि तोच पती रागात असला तरी पत्नी जेवली नाही, हे कळल्यावर तिच्यासमोर ताट वाढतो.
यालाच विवाह म्हणतात.
मुलं लहान असताना घर गजबजलेलं असतं. आई-वडील स्वतःला मुलांच्या शिक्षणात, लग्नात, नोकरीत, नातवंडांत पूर्णपणे झोकून देतात. पण एक दिवस मुलं आपापल्या आयुष्यात रमून जातात. हळूहळू घर रिकामं होतं.
आणि मग फक्त दोघेच उरतात.
एकेकाळी त्रासदायक वाटणारे घोरणे, एखाद्या दिवशी ऐकू आले नाही तर डोळे पाणावतात. “इतकं बोलू नकोस, ” म्हणून ज्याला रागावलं होतं, तो आवाज कायमचा शांत झाला तर घराच्या भिंतीसुद्धा ओसाड वाटतात.
एखादा माणूस गेल्यावर सांत्वनासाठी अनेकजण येतात. पण रात्री पलंगावरील रिकामी जागा कोणी भरून काढू शकत नाही. औषध देणारा हात, “जेवलास/जेवलीस का? ” असे विचारणारा आवाज, रागामागे दडलेली काळजी दाखवणारे डोळे — हे सगळं परत आणता येत नाही.
म्हणून लक्षात ठेवा…
सर्वोत्तम जोडपे ते नसते, जे कधीच भांडत नाही.
सर्वोत्तम जोडपे ते असते, जे भांडणानंतरही एकमेकांची साथ सोडत नाही.
वैवाहिक जीवनात प्रेमापेक्षा समजूतदारपणा मोठा असतो.
समजूतदारपणापेक्षा संयम मोठा असतो.
आणि संयमापेक्षाही मोठं असतं ते मन, जे शेवटपर्यंत एकत्र राहण्याचा निर्णय घेतं.
खोडकरपणा, लाज, भांडणं, शांतता, संघर्ष, आनंद, अश्रू, हसू, तडजोड — या सगळ्यांनी मिळून विवाह पवित्र बनतो.
आपला जोडीदार जिवंत असतानाच त्याची किंमत ओळखा. कारण जिवंतपणी दिलेला सन्मान हा मृत्यूनंतर गाळलेल्या अश्रूंहून अधिक पवित्र असतो.
हे नेहमी लक्षात ठेवा…
आयुष्यात परिपूर्ण जोडीदार कधीच मिळत नाही. पण तुमच्या अपूर्णता स्वीकारून शेवटपर्यंत तुमची साथ देणारा जोडीदार मिळणे, याहून मोठे भाग्य दुसरे नाही.
लेखक : अज्ञात
प्रस्तुती – श्री अनिल वामोरकर
अमरावती
≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈





