मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ “मी आणि माझं शांत, समाधानी मन” – लेखक : अज्ञात  ☆ प्रस्तुती – मंजुषा सुनीत मुळे ☆

मंजुषा सुनीत मुळे

📚 वाचताना वेचलेले 📖

☆ “मी आणि माझं शांत, समाधानी मन” – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – मंजुषा सुनीत मुळे ☆

रेल्वे गाडी हळूहळू स्टेशन सोडत होती.

खिडकीतून थंडगार वारा येत होता. समोरच्या बर्थवर माझी नजर गेली. एक हसरा चेहरा. वय साधारण ६५ च्या आसपास. एकटीच प्रवास करत होती. पाठीवर एक छोटी बॅग. मनालीची सोलो ट्रिप.

मी सहज विचारलं, “काकू, एकट्याच?

भीती नाही वाटत?”

त्या मनापासून हसल्या. अशा हसल्या, की जणू अनेक वर्षांचे ओझे त्या हसण्यात विरघळून गेले.

त्या म्हणाल्या, “बाळा, भीती तेव्हा वाटायची, जेव्हा सगळे सोबत होते. आता एकटी आहे, म्हणून खऱ्या अर्थाने मोकळी आहे.”

गप्पांच्या ओघात त्यांनी मला

एक सुंदर जीवनधडा दिला…

त्या म्हणाल्या, “मी साठीनंतर जगायला शिकले. जेव्हा मी काही गोष्टी सोडून दिल्या…”

१. नियंत्रण ठेवण्याचा हट्ट सोडला. “पूर्वी नवरा, मुलं, पैसा — सगळं आपल्या मुठीत ठेवायचा प्रयत्न करायचे. आता वाळूसारखं वाहू देते. मन खूप हलकं वाटतं.”

२. लोकांकडून अपेक्षा ठेवणं सोडलं. “मुलाने फोन केला तर आनंद, नाही केला तरी ठीक. मी त्याला जन्म दिला आहे, त्याच्यावर मालकी हक्क नाही.”

३. लोकांना बदलण्याचा प्रयत्न सोडला. “पन्नास वर्षे नवऱ्याला बदलण्याचा प्रयत्न केला. तो तसाच राहिला. मग मी स्वतःला बदललं… आणि आयुष्यात शांतता आली.”

४. प्रत्येकाला खूश ठेवण्याची धडपड सोडली. “सून, नातेवाईक, समाज  सगळ्यांना खूश करताना स्वतःलाच विसरून गेले होते. आता स्वतःशी प्रामाणिक राहते.”

५. प्रत्येक चुकीसाठी स्वतःला दोष देणं सोडलं. “भाजीत मीठ कमी-जास्त झालं, तर दिवसन्-दिवस मनाला लावून घ्यायचे. आता म्हणते – मी माणूस आहे, देव नाही.”

६. प्रत्येक परिणामाची चिंता करणं सोडलं. “रेल्वे वेळेवर येईल की उशिरा, हे माझ्या हातात नाही. मग काळजी कशाला? चहा पिते आणि निसर्गाचा आनंद घेते.”

७. भविष्याच्या भीतीने वर्तमान जगणं सोडलं. “उद्या गुडघे दुखतील म्हणून आज डोंगर चढायचा नाही? आज ताकद आहे, तर आजचा दिवस जगते.”

८. आपल्या हातात नसलेल्या गोष्टींवर ऊर्जा खर्च करणं सोडलं. “कोण काय बोलेल, राजकारणात काय होईल, शेजारी काय म्हणतील, हे सगळं सोडलं. आता रक्तदाबही सामान्य राहतो.”

आता काय करते?

“स्वतःची काळजी घेते. स्वतःशी संवाद साधते. लोक काय बोलतात ते एका कानाने ऐकते आणि दुसऱ्या कानाने सोडून देते.”

खिडकीबाहेर पाहत त्या म्हणाल्या..

“पाणी कोणत्या दिशेने वाहील हे माझ्या हातात नसतं बाळा… पण वादळातही माझी नाव डगमगू नये म्हणून वल्हं कसं चालवायचं,हे माझ्या हातात असतं.”

सुख आणि समाधान मॉलमध्ये मिळत नाही.

समाधान त्या उशीत असतं, जिथे कोणतीही तक्रार न करता शांत झोप लागते.

समाधान त्या पावलांत असतं, जी कोणत्याही भीतीशिवाय एकटी चालायला शिकतात.

मनाली स्टेशन जवळ आलं.

त्या उतरता उतरता म्हणाल्या..

“तरुणपणी मी जगाशी नाती जोडत राहिले… आता या उतारवयात स्वतःशी नातं जोडते आहे.”

म्हणूनच मी हसते… कारण आता माझ्यावर कोणतंही ओझं नाही. आता फक्त मी आहे… आणि माझं शांत, समाधानी मन.”

जीवनाचा खरा आनंद इतरांना बदलण्यात नाही, तर स्वतःला समजून घेण्यात आणि स्वीकारण्यात आहे.

लेखक: अज्ञात

प्रस्तुती : मंजुषा सुनीत मुळे 

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈ 

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ फादर्स डे ☆ श्री प्रसाद जोग ☆

श्री प्रसाद जोग

🌸 विविधा 🌸

☆ फादर्स डे ☆ श्री प्रसाद जोग

फादर्स डे – २१ जून

भारतात जूनच्या तिसऱ्या रविवारी फादर्स डे साजरा केला जातो.

अमेरिकेतल्या वॉशिंग्टनच्या स्पोकेन शहरात सोनोरा डॉड या मुलीने आपल्या वडीलांच्या आठवणीत या दिवसाची सुरुवात केली होती. हा दिवस फादर्स डे म्हणून साजरा करण्याची प्रेरणा त्यांना १९०९ मध्ये सुरु झालेल्या मदर्स डे पासून मिळाली.

अलौकिक प्रतिभेच्या जनकवी पी. सावळारामांना लता मंगेशकर यांनी विनंती केली आणि सांगितले वडिलांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी गाणं लिहा

त्या वर कल्पवृक्ष कन्येसाठी लावुनिया बाबा गेला असं अप्रतिम काव्य सावळारामांनी लिहिलं आणि वसंत प्रभूंनी त्याला स्वरसाज चढवला. लता मंगेशकर यांनी हे गाणे खूप आर्ततेने गाऊन गाण्याला अजरामर केले.

त्या गाण्याची गोष्ट ठाण्याला मनोहर रसाळ यांच्या घरात जनकवी पी. सावळाराम यांच्या ‘कल्पवृक्ष कन्येसाठी लावुनिया बाबा गेला’ या गाण्याचा जन्म झालेला आहे. ‘कृष्णा निवास’ या घराला ते भाग्य लाभले. १९६४ चा सुमार असेल. गानकोकिळा लताबाई मंगेशकर यांचा पी. साावळाराम यांच्यासाठी फोन होता. असा फोन आला की पी. सावळाराम यांना निरोप सांगितला जायचा. ते कृष्ण निवासमध्ये आल्यावर पुन्हा फोन खणखणायचा आणि मग लताबाई त्यांच्याशी बोलायच्या आणि विशिष्ठ विषयावर त्यांच्याकडे गाणं करून मागितले जायचे.

एकदा मास्टर दीनानाथांच्या पुण्यतिथीसाठी त्यांनी गाणं मागितल्यावर पी. सावळारामांनी क्षणार्धात ‘कल्पवृक्ष कन्येसाठी लावुनिया बाबा गेला’ हे अजरामर गाण्याचे बोल ऐकविले.

कल्पवृक्ष कन्येसाठी लावुनिया बाबा गेला वैभवाने बहरुन आला, याल का हो बघायाला

तुम्ही गेला आणिक, तुमच्या देवपण नावा आले सप्तस्वर्ग चालत येता, थोरपण तुमचे कळले गंगेकाठी घर हे अपुले, तीर्थक्षेत्र काशी झाले! तुम्हावीण शोभा नाही, वैभवाच्या देऊळाला

सूर्य, चंद्र तुमचे डोळे दुरुनीच ते बघतात कमी नाही आता काही, कृपादृष्टीची बरसात पाच बोटे अमृताची, पंचप्राण तुमचे त्यात पाठीवरी फिरवा हात, या हो बाबा एकच वेळा

रेकॉर्ड मध्ये नसलेलं कल्पवृक्ष कन्येसाठी गाण्यातलं तिसरं कडवं साडेतीन मिनिटांच्या रेकॉर्डच्या मर्यादेमुळे या गीताचे दोनच अंतरे गाण्यात घेतले आहेत. एक नाईलाजाने सोडलेला अंतराही फारच हृद्य आहे. तो असा आहे:

तिन्ही सांजा येऊन मिळता, सांजवात लावित असता हात जोडलेले तुम्हां, माई सांगे तुमची गीता दु:ख मित्र तुमचा प्यारा, आठवण देऊन जाता मिठी आईची ती कंठी, थांबेनात अश्रुमाला।

या अंतऱ्यातील शेवटच्या ओळीसाठी ‘तुमच्याच मूर्तीला हो आम्ही घालू अश्रुमाला’ ही पर्यायी ओळ सुद्धा सावळाराम यांनी लिहून ठेवली होती.

प्रतिभावंत लेखक, कवी ह्यांच्या मनात अशा अनेक विषय घोळत असतात आणि त्यांच्या प्रभिभेला असं कारण कारण मिळाले, की त्या विचारांना शब्दरूप मिळते, आणि अजरामर साहित्य कृती चा जन्म होतो.

वडिलांप्रती असलेले प्रेम, जिव्हाळाआणि कृतज्ञता पी. सावळारामांनी किती अर्थपूर्ण शब्दात व्यक्त केली आहे.

 

© श्री प्रसाद जोग

सांगली

मो ९४२२०४११५०   

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ नियमांचे पालन… ☆ डॉ मकरंद पिंपुटकर ☆

डॉ मकरंद पिंपुटकर

??

☆ नियमांचे पालन… ☆ डॉ मकरंद पिंपुटकर 

रविवारची सकाळ.

चिंचवडहून जवळच पिंपरीला सहकुटुंब सहपरिवार जाण्याचा अनिल देशमुखांचा बेत ठरला होता.

सरकारी खात्यातील अधिकारी अनिल देशमुख हे त्यांच्या प्रामाणिकपणासाठी आणि कायद्याचे काटेकोर पालन करण्यासाठी वाखाणले जात. ऑफिसमध्ये तर लोक त्यांना “नियमपुस्तक”च म्हणायचे.

त्या दिवशी, पत्नी स्वाती, आठ वर्षांचा मुलगा अथर्व आणि पाच वर्षांची मुलगी गौरी यांना घेऊन ते घराबाहेर पडले.

घरापासून अंतर फार नव्हते. “अरे, एवढ्याशा अंतरासाठी कार कशाला?  शिवाय मित्राकडे पार्किंगचाही प्रश्न असतो. ” असा विचार करून अनिल यांनी स्कूटर काढली.

स्वाती मागे बसली. तिच्या मांडीवर गौरी. आणि अनिल यांच्यासमोर अथर्व.

रस्त्यावर वाहतूक तुलनेने कमी होती.

एकीकडे गप्पा, मुलांचा गोंधळ आणि बडबड सुरू होती आणि स्कूटर पुढे जात होती.

समोर थोड्या अंतरावर रस्त्याच्या कडेला एक पांढरी कार उभी होती. कारमध्ये चालक बसलेला होता.

अनिल स्कूटरने कारला ओलांडत होते, इतक्यात…

धाडकन्! – – कारच्या चालकाने कोणतीही सूचना न देता अचानक दरवाजा उघडला आणि तोंडातील तंबाखूची पिचकारी मारली.

दरवाजा स्कूटरवर आदळला, स्कूटरचा तोल गेला.

अनिल, स्वाती, अथर्व आणि गौरी चौघेही रस्त्यावर आपटले.

सुदैवाने गंभीर दुखापत झाली नाही, पण मुलं घाबरून रडू लागली.

अनिल संतापाने उठले.

“हे काय केलं तुम्ही?  दरवाजा उघडण्यापूर्वी मागे बघायचं नसतं का? “

कार चालक निवांतपणे खाली उतरला. त्याच्या चेहऱ्यावर पश्चात्तापाचा लवलेशही नव्हता.

“त्यात एवढं काय झालं? “

“तुमच्यामुळे आम्ही पडलो! “

“तुम्ही जरा सांभाळून चालवायला हवं होतं. “

“म्हणजे चूक तुमची आणि दोष आमचा? “

“रस्त्यावर चालताना खबरदारी घ्यायची असते. “

– – हे ऐकताच अनिल यांच्या रागाचा पारा चढला.

“मी आता थेट पोलीस स्टेशनमध्ये तक्रार करतो. “

“जा ना. कुणी अडवलंय? ” चालकाने खांदे उडवले, त्याला काहीच फिकीर नव्हती.

अनिल यांनी गाडीचा नंबर लिहून घेतला, गाडीचा, दाराबाहेर मारलेल्या तंबाखूच्या पिचकारीचा आणि पडलेल्या स्कूटरचा फोटो काढला. हे फोटो काढताना आतल्या ड्रायव्हरचा फोटो येईल याचीही काळजी त्यांनी घेतली.

पंधरा मिनिटांत अनिल पोलीस स्टेशनमध्ये पोहोचले.

कपाळाला खरचटलं होतं. शर्ट कोपऱ्यावर फाटला होता. मुलं अजूनही घाबरलेली होती.

ड्युटीवरील कॉन्स्टेबलने खुर्ची पुढे केली.

अनिल यांनी आपले सरकारी ओळखपत्र (आय कार्ड) दाखवले. राज्य शासनात वर्ग-एक अधिकारी. आय कार्ड पाहताच कॉन्स्टेबलने लगेच उभं राहून कडक सलाम ठोकला.

“काय झालं साहेब? “

अनिल यांनी संपूर्ण घटना सांगितली. कॉन्स्टेबलने मान डोलावली.

“हो, दरवाजा बेफिकिरीने उघडणं हा गंभीर प्रकार आहे. तुमची तक्रार लिहून घेतो. “

– – अनिल यांना हायसं वाटलं.

कॉन्स्टेबलने वही उघडली. देशमुखांचे नाव, हुद्दा लिहिला आणि पुढील माहिती विचारू लागला.

“घटना कशी घडली? “

अनिल तपशीलवार सांगू लागले.

– कॉन्स्टेबल लिहीत होता. अचानक त्याने पेन खाली ठेवलं. डोकं वर केलं. आणि शांतपणे विचारलं,

“साहेब, स्कूटरवर कोण कोण होतं? “

“आम्ही चौघे. “

“म्हणजे तुम्ही, पत्नी आणि दोन मुलं? “

“हो. “

कॉन्स्टेबल पुन्हा शांत झाला.

“साहेब, तुमची तक्रार खरी आहे. कार चालकाची चूकही दिसते आहे. “

“मग एफआयआर नोंदवा. “

कॉन्स्टेबल किंचित हसला.

“एफआयआर नोंदवण्याआधी मला आधी एक दुसरी नोंद करावी लागेल. “

“कुठली? “

“चार जणांना दुचाकीवर बसवून वाहतूक नियमांचे उल्लंघन केल्याची. “

अनिल गप्प.

कॉन्स्टेबल पुढे म्हणाला,

“तुम्ही स्वतः सरकारी अधिकारी आहात. “

“हो. “

“कायद्याचं ज्ञान आहे? “

“अर्थात. “

“मग दुचाकीवर फक्त दोन जणांना परवानगी असताना चौघे का बसलात? “

… अनिल यांच्या तोंडून शब्द फुटेना. काही क्षण शांतता पसरली.

आत्तापर्यंत त्यांना वाटत होतं की ते फक्त पीडित आहेत. पण आता चित्र वेगळं दिसू लागलं.

– – कार चालकाची बेफिकिरी चुकीची होतीच. पण स्वतःची चूकही ते नाकारू शकत नव्हते.

कॉन्स्टेबल म्हणाला,

“साहेब, कायदा हा फक्त इतरांनी पाळावा म्हणून नसतो. तो सगळ्यांसाठी सारखाच असतो. तुमची तक्रार आम्ही नक्की घेऊ. पण त्याचबरोबर तुमच्यावर झालेल्या नियमभंगाची नोंदही करावी लागेल. “

अनिल काही क्षण खाली मान घालून बसले.

नंतर त्यांनी खोल श्वास घेतला.

“तुम्ही बरोबर आहात. “

कॉन्स्टेबल आश्चर्याने त्यांच्याकडे पाहू लागला.

“माझी तक्रार नोंदवा. आणि माझ्यावरचा दंडही करा. “

– – पोलिस स्टेशनबाहेर पडताना अनिल यांच्या मनात अनेक विचार चालले होते.

कार चालकाची चूक त्यांना न्यायालयात सिद्ध करता आली असती.

पण त्या दिवसाने त्यांना आणखी मोठा धडा दिला होता…..

… कायद्याचा आधार मागण्याचा नैतिक अधिकार तेव्हाच मिळतो, जेव्हा आपण स्वतःही तोच कायदा पाळत असतो.

रस्त्यावरची जखम काही दिवसांत भरून निघाली.

… पण त्या दिवसाचा धडा कायमचा मनावर कोरला गेला—

“इतरांच्या चुकीकडे बोट दाखवताना उरलेली तीन बोटं अनेकदा स्वतःकडेच वळलेली असतात. “

© डॉ मकरंद पिंपुटकर

चिंचवड

मो ८६९८०५३२१५   

≈ संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ “मरणासक्ती!!” ☆ श्री संभाजी बबन गायके ☆

श्री संभाजी बबन गायके

 

??

“मरणासक्ती! ! ☆ श्री संभाजी बबन गायके 

कोन्द्रागुंटा महालक्ष्मीअम्मा

मरणासक्ती!

 – – उस जगह ही निकले दम!

जन्माचा किनारा सोडून आयुष्याची नौका पैलतीराकडे मार्गाक्रमण करीत निघते तेंव्हा आपण जिथपर्यंत येऊन ठेपलेलो असतो, तिथून एैलतीर तसा फार दूर आहे, असं वाटत नाही! मध्यावर आलो असता ना अलीकडचा ना पलीकडचा.. कोणताच तीर दृष्टीस पडत नाही.

दिवसांच्या लाटा आपल्याही नकळत पैलतीर गाठण्याच्या तजविजीमध्ये गुंतलेल्या असतात… या जलाशयातला वारा नेहमीच पैलतीराकडे जाण्यासाठी अनुकूल असतो. आपल्या शेजारून, बाजूने आणि पुढे अशा कित्येक नौका निघालेल्या आपण नित्य पाहात असतो… आणि मग मनाच्या खोल तळाशी रुतून बसलेला मरणविचार पृष्ठभागावर येऊ पाहतो… आपणही तिकडेच निघालो आहोत… प्रश्न केवळ काळाचा आहे. एक मरे त्याचा दुजा शोक वाहे.. अकस्मात तोही पुढा जात आहे… ह्या भारांच्या पंक्ती आपण कैकदा ऐकलेल्या, उच्चारलेल्या असतात… त्यांतील एक एक शब्द मन:पटलासमोर येऊन नाचू लागतो.

आता जगण्याच्या काळजीपेक्षा मरण्याची चिंता चित्तास अधिक भिवविते. कुठे जन्म व्हावा, हे सर्वस्वी ईश्वराधीन. पण मग मृत्यूचं ठिकाण तरी आपल्या हाती असावं की नाही?  पण हीही सवलत दैवानं मानवाला दिलेली नाही, हेही खरंच. पण अनेक हृदयांचं त्या जन्मदात्या परमेश्वराकडे ही मागणी मात्र असते… जिस जगह पैदा हुए… उस जगह ही निकले दम!

१९६१ मध्ये आलेल्या ‘काबुलीवाला’ या हिंदी चित्रपटात नायकाच्या तोंडी प्रेम धवन यांनी लिहिलेलं आणि सलील चौधरी यांनी संगीतबद्ध केलेलं मन्ना डे यांच्या आवाजातील एक अजरामर गीत आहे…

… “ऐ मेरे वतन, ऐ मेरे बिछडे चमन… तुझ पे दिल कुर्बान. ” – – या गाण्यात एक ओळ आहे…

छोड़ कर तेरी ज़मीं को दूर आ पहुँचे हैं हम…

 फिर भी है ये ही तमन्ना तेरे ज़र्रों की क़सम 

 हम जहाँ पैदा हुए उस जगह ही निकले दम 

 ज्या मातीतून आपण उगवलो, त्याच मातीत अंतिमत:मिसळून जाण्याची इच्छा असणं हे माणसाच्या ओल्या मनाचं आणि स्निग्ध काळजाचं एक अतिनाजूक लक्षण म्हणावं. देहातून आत्म्याने प्रस्थान केल्यावर देह कणाकणाने आणि क्षणाक्षणाने मातीशी एकरूप होण्याच्या प्रक्रियेत घाईघाईने सहभागी होतो. आणि मग शेवटी उरते ते मातीच. पण ही माती जगात कोणत्या मातीशी एकरूप व्हावी ही इच्छा माणूस का बरं करीत असावा?  याचं कारण आहे… प्रत्येक मातीचा गंध, पोत निराळा असतो! मृदगंध बालपणीपासूनच रंध्रारंध्रात पेरला जातो आणि देह व्यापून उरतो.

म्हणूनच रूग्णालयात मृत्यूची प्रतीक्षा करणारा जीव घरी, मुला-बाळांच्या संगतीत शेवटचे क्षण जावेत, असा ध्यास धरतो. व्यवहारातील अडचणी काहीवेळा असं होऊ देत नाहीत. मग किमान अंत्यसंस्कार तरी गावाच्या मातीत व्हावेत, अशी इच्छा निर्माण होते… ही इच्छा काळ, परिस्थिती पूर्णत्वास नेईल की नाही… हे आपल्या हातात नसते!

जन्माला आलेल्या बालकाला जसं आरंभी गर्भातला काळ स्मरत राहतो… तसं म्हातारपणी माणसाचं होत असावं का?  आईच्या गर्भात ज्या स्थितीत बाळ तरंगत असतं, अगदी त्याच अवस्थेत मुलं पाय पोटाशी घेऊन, अंगठा तोंडात घेऊन निजलेली दिसतात बरेच दिवस! जन्मभूमीचं असंच आहे का?

कोन्द्रागुंटा महालक्ष्मीअम्मा या आज ९४ वर्षांच्या आहेत. २००१ मध्ये त्या पतीसोबत अमेरिकेत गेल्या आणि तिथले नागरिकत्व घेऊन तिथे स्थिरावल्या. त्यांच्या पतींचे नुकतेच निधन झाले. दोन वर्षांपूर्वी त्या आंध्रप्रदेशातील चिंथागम्पाला या गावी राहायला आल्या आहेत. त्यांनी आता भारतीय नागरिकत्व मिळावे यासाठी जिल्हाधिकाऱ्यांकडे अर्ज केला आहे… त्या म्हणतात… माझ्या जीवनाची अखेर आता आली आहे… मला भारतीय म्हणून मरण यावे, अशी माझी अंतिम इच्छा असून माझे अंतिम संस्कार माझ्या गावीच व्हावेत!

माणसाची जगण्याची उर्मी आणि मरणाची इच्छा मानवी भावजगतातील एक अतिशय गुंतागुंतीची भावना आहे… किमान प्रत्येकाची ही अंतिम इच्छा तरी पूर्ण व्हावी! जगण्याच्या विचारापेक्षा मरणाचा विचार आपल्या संस्कृतीत खूप गांभीर्याने केला जातो, हे खरेच!

श्री गंगा जी का तट हो, यमुना का वंशीवट हो

मेरा सांवरा निकट हो, जब प्राण तन से निकले… ही मागणी सुद्धा त्यामुळेच मनाला भावते!

 

© श्री संभाजी बबन गायके 

पुणे

9881298260

≈ संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ ग्रंथराज श्रीमद् दासबोध : महात्म्य निरूपण ☆ श्री दिवाकर बुरसे ☆

श्री दिवाकर बुरसे

? इंद्रधनुष्य ?

☆ ग्रंथराज श्रीमद् दासबोध : महात्म्य निरूपण ☆ श्री दिवाकर बुरसे

आयुर्वेद रोगनिवारण नव्हे तर रोग होऊ नयेत यासाठी मार्गदर्शन करणारी उपचारपद्धती आहे. तसाच श्रीमद् दासबोध सुद्धा अशीच _सकारात्मक जीवनदृष्टी देणारा अलौकिक ग्रंथ_ आहे. आपत्ती आल्यानंतर उपाय सांगण्याऐवजी, विवेक, चातुर्य व सजगतेने त्या टाळण्यावर समर्थ रामदासांचा भर आहे. दासबोध भक्तिमार्गाचा पुरस्कार करतो. तो माणसाला दुःख–सुखाच्या पलीकडे नेऊन आनंदरूप आत्मारामाकडे घेऊन जातो. _” भक्तिचेनि योगे देव । निश्चये पावती मानव । ऐसा आहे अभिप्राव । इये ग्रंथी ॥“

समर्थांनी दासबोधाचा आरंभ पारंपारिक पद्धतीने, म्हणजे गणेश वंदना, सरस्वती, सद्गुरू वंदना करून न करता अतिशय अभिनव पद्धतीने केला आहे. पहिल्या दशकाच्या पाहिल्या समासाच्या पहिल्याच ओवीत ग्रंथाचे नाव, त्याचा प्रतिपाद्य विषय सांगून हा ग्रंथ लिहिताना उपयोगात आणलेल्या अनेक संदर्भ ग्रंथाची, भगवद्वचनांची सूचीच ते सादर करतात. येवदं करूनही ते थांबलेले नाहीत, पुढे ते स्पष्ट करतात की हे सर्व संदर्भ, त्यातील सिद्धांत, तत्वे आणि सूत्रे आम्ही आत्मप्रचितीच्या निकषावर घासून, त्यांचा स्वतः अनुभव घेऊन वाचकांना सांगत आहोत. केवढा हा आत्मविश्वास!

दासबोध संसाराचा तिरस्कार करत नाही. उलट, “संसार करावा नेटका” असे सांगत, तो रामरायाचा आहे या भावनेने विवेकपूर्वक व यशस्वी करण्याचा आग्रह धरतो. संसारात राहूनही परमार्थ साधता येतो; वनवास, देहक्लेश किंवा अघोरी साधनांना येथे स्थान नाही.

समर्थांच्या मते _नरदेह अत्यंत दुर्लभ घबाड आहे. तो भगवंताचे राऊळ असून, साधना, सेवा व भक्तीसाठीच वापरायचा आहे. देह म्हणजे मी नव्हे, हे जाणून त्याची काळजी घेणे आवश्यक आहे. अखेरीस देह नाश पावतो, पण “मरावे परी कीर्तिरूपी उरावे” हे जीवनधर्म आहे.

समर्थांना आळशी, बावळट, दांभिक अध्यात्म मान्य नाही.  त्यांचा आदर्श पुरुष उद्यमशील, चाणाक्ष, चिकित्सक, नम्र व गुणसंपन्न आहे. अध्यात्मिक वृत्तीच्या माणसाने दरिद्री राहावे असे त्यांना अभिप्रेत नाही. भौतिक समृद्धी आवश्यक आहे; ती सचोटी, प्रयत्न व कौशल्याने मिळवावी. मात्र ही समृद्धी आत्मारामाच्या प्राप्तीसाठी साधन असावी, अंतिम ध्येय नव्हे.

व्यक्तिमत्व विकासावर समर्थांचा ठाम विश्वास आहे.  जन्मदत्त गुण दैवाधीन असले तरी, प्रयत्नाने भाग्यरेषाही बदलता येतात हा त्यांचा सिद्धांत आहे. विविध विद्या, कला, साहित्य, संगीत, वक्तृत्व, राजकारण, अर्थकारण यांत निपुण होऊन स्वतःची आणि समाजाची उन्नती साधावी, असे दासबोध सांगतो. आत्मोन्नती आणि समाजोन्नती या दोन्हींचा येथे समतोल आहे.

औपचारिक शिक्षण न घेता समर्थांनी जीवनविश्वविद्यालयातून प्रचंड ज्ञान मिळविले आणि ते दासबोधात अनुभवसिद्ध स्वरूपात मांडले. त्यांनी देशभर मठांची स्थापना करून संघटन, जनजागृती व राष्ट्रउभारणी केली. छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्यस्थापनेत त्यांचे मार्गदर्शन निर्णायक ठरले.

दासबोधात  व्यवस्थापनशास्त्रातली मूलतत्त्वे आढळतात.

संवादकौशल्य, नेतृत्व, नियोजन, मनुष्यबळ विकास, प्रेरणा, वेळेचे व्यवस्थापन, संघबांधणी इत्यादी विषयांचा सूक्ष्म विचार येथे आहे. त्यामुळे हा ग्रंथ व्यवस्थापन अभ्यासकांसाठीही मौलिक ठरतो.

ग्रंथाची मांडणी अत्यंत शास्त्रशुद्ध, स्पष्ट व आधुनिक आहे.  भाषा सुबोध, रसाळ व नादमधुर असून, समर्थ कधी प्रेमाने तर कधी कठोरपणे वाचकाला योग्य दिशा दाखवतात. राष्ट्रभक्ती, मानवप्रेम आणि ईश्वरप्रेम हे त्यांच्या काव्याचे आत्मतत्त्व आहे.

दासबोध हा अनुभवसिद्ध ग्रंथ आहे. “असे आहे” या ठाम भूमिकेतून समर्थ बोलतात. काही विचार आज कालसुसंगत नसले तरी, त्यावरून संपूर्ण ग्रंथ नाकारणे योग्य नाही.

अखेर,  दासबोध हा केवळ पारायणाचा नव्हे तर जगण्याचा ग्रंथ आहे. 

चारशे वर्षांपासून तो मानवजातीला प्रकाश देत आहे आणि पुढेही देत राहील. म्हणूनच तो प्रत्येकासाठी वाचनीय, चिंतनीय व अनुकरणीय आहे आणि त्याचा प्रसार होणे अत्यावश्यक आहे.

🙏🏻

© श्री दिवाकर बुरसे

पुणे

संपर्कः ९२८४३००१२५, ९५५२६२९२४५

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ अंतिम प्लासिबो इफेक्ट – माहिती संग्राहक : अज्ञात ☆ प्रस्तुती – अंजली दिलीप गोखले ☆

अंजली दिलीप गोखले

? इंद्रधनुष्य ?

☆ अंतिम प्लासिबो इफेक्ट – माहिती संग्राहक : अज्ञात ☆ प्रस्तुती – अंजली दिलीप गोखले

डॉ. एलेन लॅंगर

अंतिम प्लासिबो इफेक्ट!

काठीच्या आधाराने चालणाऱ्या वृद्ध पुरुषांचा एक गट एका घरात शिरला… आणि आठवड्याभराने ते धावत बाहेर पडले!

ना औषध, ना शस्त्रक्रिया.

फक्त त्यांच्या मेंदूतला एक छोटासा स्विच ‘ऑन’ केल्यामुळे.

कसे..?

ही घटना १९७९ साली घडली.

हार्वर्ड विद्यापीठातील एक अत्यंत बुद्धिमान मानसशास्त्रज्ञ – 

डॉ. एलेन लॅंगर – यांनी काहीतरी विलक्षण करण्याचा निर्णय घेतला. त्यांना टाइम ट्रॅव्हल करायचे होते, पण कोणत्याही मशीनशिवाय.

त्यांनी जवळजवळ ८० वर्षांचे आठ वृद्ध पुरुष निवडले. काहींना काठीशिवाय चालता येत नव्हते, काहींचे हात थरथरत होते, काहींना मोतीबिंदू होता, तर काहींना स्वतःचे नावसुद्धा नीट आठवत नव्हते.

त्यांच्या मुलांना वाटले की त्यांच्या वडिलांना वृद्धाश्रमात पाठवले जात आहे.

पण त्यांना हे माहीत नव्हते की त्यांच्या वडिलांना १९५९ साली पाठवले जात होते!

नाही, कोणतेही जादुई जग नव्हते.

डॉ. लॅंगर यांनी बोस्टनमधील एका जुन्या मठाची सजावट पूर्णपणे १९५९ च्या शैलीत केली होती. तिथे १९७९ चा कसलाही मागमूस नव्हता. टीव्ही काळा-पांढरा होता, त्यावर १९५९ मधील बातम्या आणि Ed Sullivan Show चालू होते. रेडिओवर त्या काळातील गाणी होती. मासिके, वर्तमानपत्रे—सगळेच वीस वर्षे जुने!

आता कथेतला पहिला धक्का…

ते आठ वृद्ध पुरुष तिथे पोहोचल्यावर त्यांना वाटले की कोणी तरी येऊन त्यांचे सामान खोलीत नेऊन देईल—जसं त्यांच्या घरी होत असे.

पण डॉ. लॅंगर ठामपणे म्हणाल्या,

“इथे कोणीही तुमची मदत करणार नाही. तुम्हालाच तुमच्या बॅगा उचलून न्याव्या लागतील. ”

ते चिडले, कुरकुरले.

पण पर्याय नसल्यामुळे जड सूटकेसेस घेऊन जिना चढले.

आणि तिथेच त्यांच्या मेंदूला पहिला संदेश गेला—

“मी असहाय नाही… मी हे करू शकतो. ”

एकच अट होती—या एका आठवड्यासाठी त्यांना असे वागायचे होते की साल १९५९ आहे.

त्यांना भूतकाळात बोलायचे नव्हते, फक्त वर्तमानकाळात.

उदा. “आत्ता राष्ट्राध्यक्ष आयझनहॉवर काय करत आहेत? ”

किंवा “हवाना मध्ये कास्त्रो काय करत आहेत? ”

त्या काळातील राजकारण, खेळ, चित्रपट—सगळ्यांवर चर्चा करायची होती, जणू ते अजूनही तिथेच जगत होते.

ज्या वयात त्यांच्यात जी ऊर्जा होती—५५–६० वर्षांची—त्याच ऊर्जेने बोलायचे होते.

पहिले दोन दिवस फार अवघड गेले.

पण तिसऱ्या दिवसापासून एक विचित्र जादू सुरू झाली.

संधिवातामुळे सरळ बसू न शकणारा माणूस आता जेवणाच्या टेबलावर ताठ बसून राजकारणावर वाद घालत होता.

ज्याला नीट ऐकू येत नव्हते, तो रेडिओचा आवाज कमी करून गाणी ऐकत होता.

तो संपूर्ण वातावरणच त्यांना सांगत होते—

“तुम्ही म्हातारे नाही… तुम्ही अजूनही मजबूत, मध्यमवयीन आहात. ”

सर्वात मोठा धक्का आठवड्याच्या शेवटच्या दिवशी बसला.

आश्रमासमोरील मैदानातले दृश्य पाहून डॉ. लॅंगर यांना स्वतःच्या डोळ्यांवर विश्वास बसत नव्हता.

आठवडाभरापूर्वी बसमधून उतरताना इतरांची मदत घेणारे हे वृद्ध पुरुष आता मैदानात ‘टच फुटबॉल’ खेळत होते!

हो, फुटबॉल!

त्यांना धावताना पाहून असं वाटत होतं, जणू त्यांचे वय खरंच २० वर्षांनी कमी झाले आहे.

प्रयोगाच्या शेवटी जेव्हा त्यांची शारीरिक तपासणी झाली, तेव्हा डॉक्टरही थक्क झाले.

त्यांची पकड (grip strength) वाढली होती, सांध्यांची लवचिकता सुधारली होती, दृष्टी आणि श्रवणशक्तीही सुधारली होती!

चष्म्याशिवाय लहान अक्षरे वाचता येत होती.

त्यांचा IQ स्कोअरही वाढला होता.

सगळ्यात रंजक गोष्ट म्हणजे—

प्रयोगापूर्वी आणि नंतरचे फोटो जेव्हा अशा लोकांना दाखवले गेले ज्यांना या प्रयोगाबद्दल काहीच माहीत नव्हते, ते म्हणाले,

“नंतरच्या फोटोमध्ये हे लोक खूपच तरुण दिसतात! ”

म्हणजे फक्त त्यांची भावना नाही, तर चेहऱ्यावरील सुरकुत्याही कमी झाल्या होत्या.

जैविकदृष्ट्याही त्यांचे वय मागे गेले होते!

डॉ. एलेन लॅंगर यांनी हे सिद्ध केले की जेव्हा आपण स्वतःला सांगतो—

“मी म्हातारा झालोय, आता माझ्याकडून होत नाही”—

तेव्हा आपले शरीर ते मान्य करते आणि हळूहळू बंद पडू लागते.

आपला समाज आपल्याला शिकवतो की म्हातारपण म्हणजे आजारपण.

आणि आपण तेच स्क्रिप्ट फॉलो करतो.

पण जेव्हा त्या वृद्ध लोकांचे वातावरण बदलले आणि त्यांना अजूनही तरुण आहोत असे वाटायला लावले, तेव्हा त्यांच्या शरीरानेही तसाच प्रतिसाद दिला.

यालाच म्हणतात “Mind–Body Connection” — किंवा अंतिम प्लासिबो इफेक्ट!

म्हणून मित्रांनो,

कधी कधी म्हणता 

“मूड नाहीये, थकवा आलाय, माझ्याकडून नाही होणार…”

जरा विचार करा 

८० वर्षांचे लोक फक्त विचार बदलून काठ्या फेकून देतात आणि फुटबॉल खेळतात, तर तू काय नाही करू शकणार?

तुझ्या मर्यादा शरीरात नाहीत, त्या मनात आहेत…..

जेव्हा तू स्वतःला कमकुवत समजतोस, तेव्हा तू कमकुवत होतोस.

आणि जेव्हा तू स्वतःला सुपरहिरो समजतोस, तेव्हा मेंदू शरीराला तसा सिग्नल देतो.

फोन बाजूला ठेव, आरशात बघ आणि म्हण—

“मी बॉस आहे. माझ्या ऊर्जेला मर्यादा नाहीत. ”

माझ्यावर विश्वास ठेव—

तुझं शरीर ते ऐकायलाच लागेल.

सुरुवात कर.

जग तुझी वाट पाहत आहे..!

माहिती संग्राहक : अज्ञात 

प्रस्तुती : अंजली दिलीप गोखले 

मोबाईल नंबर 8482939011

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ “सुदामा…” – लेखक : अज्ञात ☆ शोभा जोशी ☆

शोभा जोशी 

? वाचताना वेचलेले ?

☆ “सुदामा…” – लेखक : अज्ञात ☆ शोभा जोशी

सुदाम्यासोबत बोलता बोलता श्रीकृष्ण कधी त्याचे पाय दाबू लागले, हे सुदाम्याला कळलंच नाही. सुदामा तर झोपून गेला होता, पण कृष्ण स्वतःच्या विचारांत मग्न होऊन त्याचे पाय दाबत दाबत बालपणाच्या आठवणी बोलत होते. इतक्यात रुक्मिणीने त्यांच्या खांद्यावर हात ठेवला.

कृष्ण दचकले. आधी त्यांनी रुक्मिणीकडे पाहिले, मग सुदाम्याकडे, आणि परिस्थिती समजताच तेथून उठून आपल्या कक्षात आले.

कृष्णांची अशी अवस्था पाहून रुक्मिणी म्हणाल्या, “स्वामी, आज तुमचं वर्तन फारच अद्भुत वाटत आहे.

तुम्ही.. जे, या जगातील सर्वात मोठे सम्राट जरी द्वारकेत आले तरीही जरा सुद्धा प्रभावित होत नाही, ते आपल्या मित्राच्या आगमनाच्या बातमीने इतके भावूक झालात की जेवण सोडून उघड्या पायाने त्याला घ्यायला धावत गेलात.

तुम्ही, ज्यांना कोणतंही दुःख, कष्ट किंवा आव्हान कधी रडवू शकले नाही, अगदी गोकुळ सोडताना माई यशोदांच्या डोळ्यातले अश्रू पाहूनही तुम्ही रडला नाहीत, ते तुम्ही तुमच्या मित्राचे जीर्ण- शीर्ण आणि जखमांनी भरलेले पाय पाहून इतके भावुक झालात की तुमच्या अश्रूंनीच त्याचे पाय धुतले.

कूटनीती, राजकारण आणि ज्ञानाचे शिखर असलेले तुम्ही, तुमच्या मित्राला पाहून इतके तल्लीन झालात की विचार न करता त्याला तिन्ही लोकांची सर्व संपत्ती आणि समृद्धी देण्याचा निर्णय घेतलात. “

कृष्ण त्याच आनंदी अवस्थेत म्हणाले, “तो माझा बालपणीचा ‘मित्र’ आहे, रुक्मिणी. “

“पण बालपणी गुरुमातेनं तुम्हा दोघांना वाटून खायला दिलेले हरभरे त्याने तुमच्यापासून लपवून खाल्ले होते ना?  मग अशा मित्रासाठी एवढी भावना का? ” सत्यभामेनेही आपली उत्सुकता व्यक्त केली.

कृष्ण हसत म्हणाले, “सुदाम्याने असं कार्य केलं आहे, सत्यभामे, की संपूर्ण सृष्टीने त्याचे आभार मानले पाहिजेत. त्याने ते हरभरे भुकेमुळे नाही खाल्ले, तर यासाठी खाल्ले की त्याला नको होतं की त्याचा मित्र कृष्ण दारिद्र्य पाहो.

त्याला माहिती होतं की ते हरभरे आश्रमात चोरांनी सोडून दिले होते, आणि ते एका ब्राह्मण स्त्रीच्या घरातून चोरले गेले होते. त्याला हेही ठाऊक होतं की त्या ब्राह्मण स्त्रीनं शाप दिला होता की जो कोणी ते हरभरे खाईल, तो आयुष्यभर दरिद्री राहील.

सुदाम्याने ते हरभरे माझ्यापासून लपवून खाल्ले, जेणेकरून मी सुखी राहीन. तो मला ईश्वराचा अंश मानत होता, म्हणून त्याने ते खाल्ले, कारण त्याला वाटलं की जर ईश्वरच दरिद्री झाला, तर संपूर्ण सृष्टीच दरिद्री होईल. सुदाम्याने संपूर्ण सृष्टीच्या कल्याणासाठी स्वतः दरिद्री होणं स्वीकारलं. “

“इतका मोठा त्याग?  ”असं रुक्मिणीच्या तोंडून आपोआपच निघालं.

“माझा मित्र ब्राह्मण आहे, रुक्मिणी, आणि ब्राह्मण ज्ञानी व त्यागी असतात. त्यांच्या हृदयात जनकल्याणाची भावना ओसंडून भरलेली असते. काही अपवाद वगळता ब्राह्मण असेच असतात.

आता तुम्हीच सांगा, अशा मित्रासाठी हृदयात प्रेम निर्माण होणार नाही तर काय होणार, प्रिये?  गोकुळ सोडताना मी म्हणून रडलो नाही, कारण मी रडलो असतो तर माझ्या माईने प्राण सोडले असते. पण माझ्या मित्राचे असे पाय पाहून, त्यातील जखमा पाहून माझं हृदय भरून आलं, रुक्मिणी.

त्याच्या पायांवरील या जखमा आणि आयुष्यातील ही अवस्था फक्त यासाठी झाली की तो आपल्या या मित्राचं भलं इच्छित होता.

रुक्मिणी, कुटुंबाव्यतिरिक्त कुणीही या कृष्णाचं इतकं भलं कधीच इच्छिलं नाही. लोक माझ्याकडून स्वतःचं भलं व्हावं अशी अपेक्षा ठेवतात. पण सुदाम्यासारखे मित्रच असे असतात, जे आपल्या मित्राच्या सुखासाठी स्वेच्छेने दारिद्र्य आणि कष्ट स्वीकारतात.

असे मित्र फार दुर्मिळ असतात, आणि कळत नाही, कोणत्या पुण्यांमुळे मिळतात. आता अशा मित्राला तिन्ही लोकांची सर्व संपत्ती दिली तरी ती कमीच पडेल,” कृष्ण भावुक आवाजात म्हणाले.

इथे कक्षात सर्व राण्यांच्या डोळ्यांत अश्रू होते, आणि तिथे कक्षाबाहेर उभ्या सुदामा यांच्या डोळ्यांतून गंगा-यमुना वाहत होत्या…

 

लेखक : अज्ञात 

प्रस्तुती :  शोभा जोशी

कार्यकर्ती, जनजाती कल्याण आश्रम, पुणे महानगर. 

मो ९४२२३१९९६२ 

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ आनंदी ज्येष्ठांसाठी दहा टिप्स – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती : श्री सुनीत मुळे ☆

श्री सुनीत मुळे

? विविधा ?

☆ आनंदी ज्येष्ठांसाठी दहा टिप्स – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती : श्री सुनीत मुळे 

🌷 प्रिय सुवर्ण ज्येष्ठांनो, चला स्वतःची परीक्षा घेऊ आणि 10/10 गुण मिळवूया… 👇🏾

 🌷 आनंदी ज्येष्ठांसाठी १० टिप्स ❤️

🌷 १.  जर तुम्हाला सकाळी अलार्म क्लॉक, मोबाईल फोन, पक्ष्यांच्या किलबिलाटाने किंवा इतर आवाजाने जाग आली, तर आनंदी व्हा आणि स्वतःला भाग्यवान समजा.  याचा अर्थ तुम्ही अजूनही या जगाचा एक भाग आहात.

🌷 २.  उठल्यावर थोडे पाणी प्या, तुमच्या ओळखीच्या, प्रेमाच्या आणि काळजीच्या लोकांना मेसेज करा.  त्यांना “शुभ सकाळ” म्हणा.  याचा अर्थ तुम्ही स्पष्ट विचार करू शकता आणि तुम्ही निरोगी आहात.  तुम्ही एका नव्या आणि सुंदर दिवसाची सुरुवात करू शकता.

🌷 ३.  जर मित्रांचे मेसेज आणि फोन येत असतील, जे तुम्हाला जेवायला किंवा वेळ घालवायला बोलावत असतील, तर याचा अर्थ तुम्ही मनमिळाऊ आहात आणि लोकांशी तुमचे चांगले संबंध आहेत.  तुमचे मित्र अजूनही तुमचा विचार करतात.

🌷 ४.  कधी कधी काही लोक तुमच्याबद्दल वाईट बोलले किंवा पाठीमागे कुजबुज केली, तर याचा अर्थ तुम्ही अजूनही त्यांच्या मनात एक महत्त्वाची व्यक्ती आहात.  ते आयुष्यात तुमच्याइतके नक्कीच यशस्वी नाहीत.  तुम्ही आनंदी आणि भाग्यवान आहात असे समजा.

🌷 ५.  जर तुम्हाला वजन वाढल्याची काळजी वाटत असेल, तर याचा अर्थ तुम्ही खूप चांगले जेवता आणि तुमचे जेवण रुचकर व पोषक तत्वांनी भरलेले आहे.  काळजी करू नका.  निरोगी जीवन, दीर्घायुष्य आणि मजबूत प्रतिकारशक्तीबद्दलचे सर्व सल्ले अन्नावरच आधारित आहेत.  फक्त नियंत्रण ठेवा आणि सर्व गोष्टी मर्यादेत ठेवा.

🌷 ६.  जर तुम्ही मित्रांसोबत अनेकदा बाहेर जात असाल, खात-पित असाल, गप्पा मारत असाल, प्रवास करत असाल, ठिकाणे पाहत असाल आणि वातावरण बदलत असाल, तर हे सिद्ध होते की तुमच्या जीवनशैलीत काही दर्जा आहे.  

🌷 ७.  जर तुमच्याकडे विनोदबुद्धी चांगली असेल, तर याचा अर्थ तुम्ही मनाने तरुण आहात आणि तुम्ही खूप निरोगी आहात.

🌷 ८.  जर तुमचे वय ६५ पार झाले असेल, तर आनंदी आणि समाधानी रहा.  एका जागतिक सर्वेक्षणानुसार, १०० पैकी फक्त ८ लोक ७० वर्षांपेक्षा जास्त जगतात.

🌷 ९.  जर तुम्ही बाहेर जाऊन सामान आणू शकता, स्वयंपाक करू शकता, तुम्हाला चांगले दिसते, ऐकू येते, मोबाईल फोनवर मेसेज कसे पाठवायचे हे माहित आहे, तुमच्या आठवणी लिहू शकता, कथा लिहू शकता – तर स्वतःला खूप भाग्यवान समजा.  तुमचे जीवन खूप यशस्वी आहे.

🌷 १०.  जर तुम्ही हा संदेश वाचत असाल आणि तुमच्या चेहऱ्यावर हास्य असेल, तर तुम्ही एक अतिशय आनंदी, तृप्त आणि समाधानी व्यक्ती आहात.

जर तुम्ही हा संदेश मित्रांसोबत शेअर करू शकलात, तर याचा अर्थ तुम्ही स्वार्थी नाही आहात.  तुम्ही दयाळू मनाचे आहात, तुम्ही अशी व्यक्ती आहात जी माणुसकीवर प्रेम करते आणि काळजी घेते.

लेखक…  अज्ञात

प्रस्तुती… श्री. सुनीत मुळे

 🌷 ज्येष्ठ मित्रांना हा संदेश पाठवा आणि आनंद पसरवा. 🙏😀

≈ संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित / मंजुषा मुळे/ गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ ”आयुष्य : एक ‘रिले’ रेस..” ☆ संध्या बेडेकर ☆

संध्या बेडेकर

? मनमंजुषेतून ?

☆ “आयुष्य : एक ‘रिले’ रेस.. ☆ संध्या बेडेकर ☆

सर्व माझ्याच ताब्यात राहिलं पाहिजे.  हा विचार बरोबर आहे का? Life is like a Relay Race. 

ताईने आपला संसार छान सांभाळला. आधी सासूबाईंच्या तालमीत, नंतर स्वतंत्र.  आजच्या पन्नास वर्षांपूर्वी जेमतेम पगार, एका परिवारात चार मुलं असणे सामान्य गोष्ट होती.  काही काही तर संयुक्त परिवार, बरोबर गावातून आलेला एखादा चुलत / मामे भाऊ घरात असणे ही सहज घडणारी/ दिसणारी गोष्ट असे.  

काही उच्चभ्रू परिवारात पंडित स्वयंपाक करायला असे.  बाकी सर्व मिडिल क्लास काम घरी करत असत.  फोन करून येणे अशी पद्धत नव्हतीच.  फोन नव्हतेच.  एवढी औपचारिकता नव्हती. आलेला पाहुणा जेवूनच जाणार.  असा अलिखित नियमच होता.

ताईने लग्नानंतर अशाच परिवारात सुरुवातीचे बरीच वर्ष काढली.  घरात हळुहळु मुल मोठी झाली, नोकरीला लागली।, सर्वांनी आपापली घर घेतली.  

एका सरळरेषेत आयुष्याची पन्नास वर्षे संपली.  त्यातील नंतरचा काळ म्हणजे तर ताई साठी हम करे सो कायदा असा होता.

आधी सासूबाईंचा, नंतर स्वतःच्या घरात ताईचा. असा हिशेब होता.

ताई ला दोन्ही मुलगेच.

घरी ताईला जे ठीक वाटेल, जे आवडेल, जस माहित असेल, ते ती करणार. तिला का? कशाला? अस का नाही, तसच का? असे प्रश्न विचारणारे कोणी नव्हतेच.  सासूबाईंच्या राज्यात ज्या काही इच्छा राहून गेल्या होत्या, त्या पूर्ण करायचा चांन्स मिळाला होता.  

आता तर एका हाती कारभार.  One in all.  सर्व Deparments ताईच्या हातात.  तिच्याच ताब्यात.  एका हाती पूर्ण राज्य.

घर व्यवस्थित चालू होत. ताईबाई खूष होत्या.

आता मोठ्या मुलाचे लग्न झाल. सून घरात आली.

पुन्हा दोन बायका घरात.  आणि मुख्य म्हणजे अनितालाही स्वयंपाक करण्याची भयंकर आवड.  आजच्या काळात ऐकायला थोडी विशेषच गोष्ट आहे ही नाही का? . पण अनिताला नोकरी करून घरकामाची आवड.  

खरतर ताईसाठी ही आनंदाची गोष्ट असायला हवी, पण तस घडत नव्हत.

ताईची अस्वस्थ्यता भाऊजीं च्या लक्षात येत होती, पण exactly कारण कळत नव्हत.

आज अनिता आॅफिस ला गेल्यानंतर लगेचच ताई उठली आणि…

भराभरा स्वयंपाक घरात जाऊन बडबड करत काही तरी आवरा आवरी करत होती. हे सामान इथे ठेव ते तिथे, हे पूस, ते पूस.  भाऊजी दरवाज्यात ऊभे राहून सर्व ऐकत होते बघत होते..  

भाऊंजीनी विचारल…  काय झाल?

तुला अनिताच काम आवडलेल दिसत नाहिये. खूप पसारा होता का?

चहाच्या डब्याच्या जागेवर साखरेचा डबा ठेवला का? आपल्या या लहानशा स्वयंपाक घरात असा काय तो किती बदल होईल ग?

एवढ बडबड करण्यासारख काही झाल आहे, अस मला वाटत नाही.

अग!! परवाच तू सांगत होती ना त्या कुलकर्णीं च्या घरची गोष्ट, की त्यांची सून अजिबात काही काम करत नाही.  सारख बाहेरून मागवत असते.  स्विगी आणि झोमॅटो त्यांच्या दाराशी उभेच असतात.  आता तुझी सुन काम करते तरी बडबड.  म्हणजे काहीच तर पटत नाही तुम्हा बायकांना.

तुझे काम एकदम perfect असत.  हे तूझ तुच ठरवलय.  कारण आम्ही कधी तुझ्या मध्ये आलोच नाही.

अर्थात तुला या स्वयंपाक घराची सवय आहे.  वस्तुंना जागेवर ठेवण तुझ्या सवयीत आहे.  तुझ्या कामाची एक पध्दत आहे.  आतापर्यंत त्यात कधी ढवळाढवळ झाली नाही. कारण आपल्याला मुलगी नाही.  

आणि आता जी आली आहे, ती तुझ्या लाडक्याची लाडकी आहे.  

अग! एवढ्या लहान सहान गोष्टींवर लक्ष देऊ नको.  स्वतः चे मनस्वास्थ्य आणि घरचे वातावरण जपायची जबाबदारी आपली आहे.  आता पूढे अशी अनेक वळण येतील, जेंव्हा आपल्याला संयम ठेवण गरजेचे असेल.  नवीन जनरेशन ची विचारसरणी आणि आपली, मॅच होण कठीण काम आहे.

अनिताला घरची ओढ आहे, कामाची आवड आहे, मुख्य म्हणजे स्वयंपाकघरात रमते ती.  

करू दे ना तिला.  

सुन आणायला एवढी उत्सुक होतीस ना तू.  आता नवीन बदल accept कर.

तुमच्यात स्पर्धा थोडी आहे.  

Life does not always go in straight line.  

Accept Change. 

तू तर तुझ्याच घरात आहेस, अनिताला तर सगळच नवीन आहे.

Stop axepcting and start accepting. 

अग! No one is Perfect, that is why pencils have erasers.

Don’t complaint just rebuild your life. 

एक हाथ पूढे करून तर बघ.  

मला भाऊजींच नेहमीच कौतुक वाटत.  एकतर लक्ष असत.  प्रोब्लेम समोर दिसला की दुर्लक्ष न करता वेळेवर स्पष्ट पण सौम्य शब्दात बोलून ते समोरच्या व्यक्तीच्या लक्षात आणून देतात.

आजही ताईच वागण म्हणजे पूढे उद्भवणार्या अनेक प्रश्नांची सुरवातच होती.  एकदा का *धुसफूस* वाढली की ती कोणत्या स्तरा पर्यंत जाईल सांगता येत नाही.  म्हणून वेळेवर इलाज व्हायलाच हवा.  

भाऊजी म्हणाले,… अग! Life is a.  Relay Race.

आता अनिताच्या हातात झेंडा दे. 

 ताईला भाऊजींचे म्हणण नेहमी पटतच अस नाही. पण तिला हे माहित आहे की चूक गोष्टीत ते साथ कधीच देत नाही.  हे नक्की.

आज अजय अनिता आॅफिस मधून घरी आले. आम्ही तीन दिवसांसाठी महाबळेश्वरला जातोय. अस म्हणाले.

अनिता म्हणाली,.. आई! ही नाटकाची तिकट ठेवा.  उद्या दुपारी आहे.  

आणि दोन दिवस तुम्ही घरी स्वयंपाक करायचा नाही..  मी तुमच्या आणि बाबांच्या आवडीचे जेवण online पाठवणार आहे.

दोन दिवस ड्राइवरला यायला सांगितले आहे.  दोघे फिरायला जा.  तुम्ही पण ब्रेक घ्या.

खरच नवीन जनरेशन वेगळाच विचार करते.  आज तर अनिताने winning six च मारला. *

ताई बघतच राहीली.

भाऊजी गालातल्या गालात हसत होते.

खरय 

You can not have one foot in old life and one foot in new life.

Life is beautiful.  If you ACCEPT change.

 

© संध्या बेडेकर 

वारजे, पुणे.  

7507340231

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ ‘फक्त वधू आणि पालक मेळावा…’ ☆ राधिका -माजगावकर- पंडित ☆

राधिका -माजगावकर- पंडित

??

☆ ‘फक्त वधू आणि पालक मेळावा’ ☆ राधिका -माजगावकर- पंडित

सामाजिक कार्य करण्याची उर्मी मनात होती.  एकटेपण खायला उठत होतं.  भला मोठा बंगला माझ्या नावावर असला तरी, ह्या मोठ्या वास्तूत मी एकटीच होते.  निसर्ग सौंदर्य न्याहळत, वाफाळता चहा घेऊन पेपर चाळतांना नेहमीची सदरे बघितली.  रोज येणारी वधु वर सूचक मेळाव्याची जाहीरात लक्ष वेधून घेत होती.  पूर्वी वडिलधारी माणसं म्हणायची परमेश्वराने जन्माआधीच लग्नाच्या जोड्या ठरवलेल्या असतात.  पण ह्या घडीला परमेश्वरी संकेतापेक्षाही जबरदस्त असलेली, मुला मुलींच्या अपेक्षांची गाडी पुढे सरकतचं नव्हती.  मुलांपेक्षाही मुलींच्या अपेक्षांचा पारडं वरचढ होतं.  

मी विचार केला त्यांनाही स्वतंत्र मतं आहेतं, त्यांची बाजू ऐकून घेऊन ब्रेन वॉश करणारी कुणी तरी समंजस व्यक्तीची आत्ता, आवश्यकता आहे.  

माझ्या रिकाम्या मनात सैतानाला घुसवण्यापेक्षा सामोपचाराच्या विचारांना मी आव्हान केलं, आणि कल्पना डोक्यात शिरली आपण वेगळं काहीतरी करायचं. ईतरांनी वधू वर सूचक मंडळ काढलय नां, आपण वधू पालक सूचक मंडळ काढायचं.

झटपट पाटी लावली. पटापट् आई-वडील आणि कन्या, माझी वेगळी पाटी वाचून हजेरी लावू लागलं.  माझ्या रिक्त, उदास मनात उत्साहाचं वारं वाहू लागलं.

आणि काय सांगू तुम्हाला,! बोलबोलता माझा हॉल गजबजला.  मेळाव्यात सगळे जण हजर झाले.  

त्यातली धीट दामिनी बोलायला उभी राहयली.  तिला मी विसाव्या वर्षी बघितलं होतं त्या वयातलं कोवळेपण हरपून ती राकट वाटली मला.  बरोबर आहे हो! आता ती 35 च्या उंबरठ्यावर उभी होती.

भरपूर आत्मविश्वास थोडासा गर्विष्ठपणा, बोलण्यातील परखड भाषा आणि अहंकार शब्दातून जाणवत होता.  

तिच्या आई-बाबांना मी म्हणाले, “आपण ही मीटिंग खाजगी न ठेवता अगदी खुल्या दिलानें खुलऊया.  काही तुमचं काही आमचंचा मध्य साधून मुला-मुलींची गाडी रुळावर आणून मार्गाला लावायचीय आपल्याला.  व्यक्तीस्वातंत्रिय स्वतंत्र् जगात आपण या मुलींच्या विचाराला, त्यांच्या मताला प्राधान्य देऊया.  त्यांची गाडी रुळावरून घसरायला लागली तर आहोतच की आपण आपलं अनुभवाचं निशाण फडकवायला.  हो ना?

माझा मिस्कील प्रश्न ऐकून हॉलभर हास्याची लकेर उमटली.  

संवादाची सुरुवातच मोकळ्या मनाने झाली होती.  पालकांच्या आणि बालिकेंच्याही चेहऱ्यावर खुशीची पावती उमटली.

पालकांकडे वळून मी म्हणाले, “दादा मला असं सांगा, वाढतं वय लक्षात घेता आपल्या मुला-मुलींच्या लग्नाला उशीर होतोय असं नाही का वाटत तुम्हाला?

चारी बाजूंनी एकदम कोरस उत्तर आलं, “आम्हाला खूप वाटतंय हो, आत्ताच मुलींनी तयारी दाखवावी.  तशी पैशाची तयारी पणआम्ही केली आहे.  फिक्स डिपॉझिट तर मुलींच्या जन्मापासूनच, म्हणजे लग्नाच्या वेळेला, तिच्या 21व्या वर्षी मिळावं, अशी पुढची तरतूद आम्ही केव्हाच करून ठेवलीय पण आता तर हीने पस्तीशी गाठलीय.  शिक्षण, अपेक्षा, गुणमिलन कशा कशाचा मेळचं बसत नाहीय्ये. नको इतकं व्यक्ती स्वातंत्र्य मिळाल्यामुळे ही पिढी आमच्या डोक्यावर बसून आम्हालाच गप्प करतेय.  ऐलतीर ना पैलतीर असं या पोरांचं भविष्य डोळ्यासमोर आणताना आमचे डोक्यावरचे केस काळजीनें, आत्ताच पांढरे झालेत.  आमची वय वाढताहेत, आमची आयुष्याची होडी पैलतीराकडे जाण्याच्या मार्गावर आहे.  त्याआधी ही मुलं मुली मार्गाला लागली तर बरं होईल हो!

एक अगतिक पिता पोटतिडीकेनी बोलत होता त्यांचं कन्यारत्न फणकारून म्हणालं, ” एवढं काय बाबा! करू की, करणारच आहोत आम्ही वेळ आल्यावर लग्न”.  

तिच्या ताठ्यातल्या उत्तराने मला तिलाच प्रश्न विचारावासा वाटला, “अगं महाभागे! मग ती वेळ कधी येणार आहे? चाळीशी उलटल्यानंतर भविष्याचा सगळं गणितच चुकेल, ” मनाला आवर घालून मी तिला शान्त करत म्हणाले, “मला एक सांग तुम्ही लग्नाचं वय कां वाढवता आहात? काही कारण? की काही अपेक्षा? आता मात्र मुलींच्या घोळक्यातल्या म्होरक्या म्हणजे नीलांबरीने पुढे होऊन उत्तर दिलं, “हो मॅडम आहेतच मुळी आमच्या मागण्या आणि अपेक्षा.  तेवढं स्वातंत्र्य आम्हाला लहानपणापासूनच मिळालय.  आमची मतं मांडण्याचा, स्वतंत्रपणे वागण्याचा आम्हाला हक्क आणि अधिकार आहेचं.  तुमच्या आधीच्या पिढीने दबाव आणून तुमचं व्यक्ती स्वातंत्र्य आढ्याला टांगलं. मन मारून इच्छेविरुद्ध तुम्हीही ते स्विकारलंत पण आम्ही नाही सहन करणार. आम्ही आमच्या मनाप्रमाणे मुक्तस्वच्छंद आयुष्य जगणार. आम्हालाही अपेक्षा आहेतच की आणि कां नसाव्या? नीलांबरीच्या लाह्या ताड्ताड् फुटत होत्या.  तिचं बघून शर्मिलालाही स्फुरण चढलं, ती म्हणाली, “मॅडम पूर्वी हुंडाबळी, सासुरवास एकत्र कुटुंबात मन मारून राहणं, आणि मोठ्या माणसांनी ठरवलेल्या मुलाला माळ घालणं हे असलं सगळं, इच्छा मारून केलं जात होतं, त्यावेळच्या लग्नाच्या मुलींनी ते सहनं केलं.  पण आम्ही नाही ते सहनकरणार. आमच्या अपेक्षा मत मांडण्याचा हक्कच आहे आम्हाला”.  

मुलींचं आवेशाचं बोलणं, पालक हताशपणे ऐकत होते.  

काही वेळेला सोनाराने कान टोचलेलेचं चांगले असतात.  म्हणूनच मी ह्या उपक्रमाचा श्रीगणेशा करायचं ठरवलं होतं. मुली तशा प्रेमळ होत्या पण तितक्याच आक्रमकही होत्या.  मी विचारलं, ” सांगा बरं! काय आहेतं तुमच्या अपेक्षा?

गलका वाढला पण मी एकावेळी एकेकीलाच बोलायची संधी दिली.  समीरा म्हणाली, “आमची पहिली अट, मुलाला पगार चांगला हवा.  तो स्मार्ट हवा.  व्हेज नॉनव्हेज खाण्यापिण्यात, पार्टीत सराईतपणे वावरणारा आणि आम्हालाही संशयाचं भूत मानेवर न ठेवता वावरू देणारा हवा. अशी कां वागलीस?

असं कां? असा कां कशाला? असे प्रश्न विचारणारा गावठी मुलगा नसावा.  तो बिनापाश असावा. ” 

तिचा धबधबा मध्ये थांबवत मी म्हणाले, “बिनापाश म्हणजे काय गं? ह्याचा अर्थ मला सांगशील?

मॅडम बिनापाश म्हणजे त्याच्याजवळ त्याचे आई-वडील, बहिण भाऊ आजीआजोबा इतर नातेवाईक कोणीच नकोत.  आम्हाला पूर्ण स्वातंत्र्य हवय”.  

तिला अडवत मी म्हणाले, विभक्त कुटुंबामुळे एकत्र कुटुंब पद्धती पार लयाला गेलीय आम्ही सासरची आजेसासूबाई, आतेसासुबाई अशी पण नाती जपली आहेत त्यांचा आशीर्वाद दुवा अजूनही आम्हाला मिळतोय. आजचे सासू-सासरे खूप समंजस आहेत. सासुरवास हा शब्द अगदी कडेपार झालाय त्यामुळे हवं तिथे हवं तेव्हा जाण्या येण्याची, करण्याची तुमच्या हक्काची जाणीव त्यांना आहे तशी मोकळीकही तुम्हाला मिळाली आहे आयुष्याच्या संध्याकाळी तुमची सोबत त्यांना हवी असते तुमचं वय झाल्यावर तुमच्यावरही अशी वेळ येणार आहे.  मुलांसाठी आयुष्य वेचलयं त्यांनी.  मग ती कां नकोत त्यांनी कुठे जायचं?

उद्धट नीलिमा म्हणाली, “आहेत की वृद्धाश्रम तिथे आनंदात रहाव यांनी.  मुलांच्या संसारात कशाला हवी आहे त्यांची लुडबुड?

“हो वृद्धाश्रम गल्लोगल्ली आहेत पण तिथे रक्ताची माणसं नाहीत. आधाराची मायेची सावली देणारी घरटी नाहीत. तडजोड मोठ्यांनी पण करायला हवी.  हे मान्य आहे.  एकमेकात सुसंवाद असले तर वादाला प्रवेशच नसतो 

आणि बरका नीलिमा तुम्ही मुलांसमोर चांगल्या वातावरणाचा एकमेकांना समजून घेण्याचा आदर्श ठेवलात की तुमच्या म्हातारपणी तुमचं जीवनही सुखाचं होईल.  तुमच्या अपेक्षा कळतात मला.  कारण पूर्वी पुरुषप्रधान संस्कृती होती, हुकूमत होती पण आता तसं नाहीये.  पालक मंडळी पण सुधारक आधुनिक विचारांची झाली आहेत. तेही तुमचे मित्र व्हायला तयार आहेत. पण कुठल्याही विचारांचा अतिरेक नसावा.  काही तुझं काही माझं अशी सामोपचाराची भाषा सगळ्यांचाच आनंद वाढवते.  तशा दृष्टीने तुम्ही सुवर्णमध्ये साधून आई-वडिलांचा मानसिक भार हलका करावा असं मला वाटतं समृद्धी म्हणाली, “करू की आम्ही लग्न पण..

तिलाअडवत मी म्हणाले, “समृद्धी हे बघ बाळ करायचं आहे लग्न तर मग हा पण कशाला? 45 व्या वर्षी लग्न त्यानंतर मुलंबाळं, नैसर्गिक दृष्ट्या स्रिची शारीरिक क्षमता नंतर कमी होते.  तुम्ही तुमची मुलं वाढवताना त्यांचं शिक्षण पूर्ण करता करता थकून जाणार. मनाची उमेद असली तरी शरीर साथ द्यायला नकार देणारचं “

अनुजा बोट नाचवत म्हणाली, “पण मॅडम आम्ही लग्नच नाही केलं तर कशाला हवीय ही भानगड आणि लग्नाची बेडी?

 तिला प्रेमाने समजावत मी म्हणाले, “अनुजा तुझ्या आई बाबांकडे बघ तुझ्या काळजीने ते आत्ताच थकलेत.  तुला चांगला जोडीदार मिळालाय, तुझं लग्न होऊन तुझा संसार सुखाचा चाललाय हे बघून तेही कृतार्थ होतील कर्तव्यपूर्तीचा आनंद त्यांनाही मिळेल 

आपलंच घोडं पुढं दामटत ती म्हणाली, ” पण मग त्यासाठी लग्नचं कशाला करायला हवं? आम्ही एकट्याही राहू शकतो की.  हे लग्नाचं बंधन कशाला?

मान्य आहे मला, तेवढ्या तुम्ही धीटही आहात, कमावत्याही आहात पण सगळ्याच गोष्टी पैशानी होत नाहीत आत्ता तारुण्याची उर्मी आहे पण कधीतरी एकटेपणा बोचायलाच लागतो.  वडीलकीच्या नात्याने आणि अनुभवानी सांगते आयुष्याच्या संध्याकाळी सोबतीची गरज असते.  म्हातारपण अटळच आहे तेव्हा हातपाय थकणारच शेवटी शरीर आहे हे, कुठलातरी आजार, अपंगत्व शरीराला आणि मनाला येणारच. पण मग तेव्हा वेळ निघून गेलेली असेल शारीरिक आणि मानसिक दृष्ट्या तुम्ही कमकुवत झालेल्या असणार अशावेळी आई-वडीलही दूरच्या प्रवासाला गेलेले असतात.  म्हणूनच वेळीच सुखदुःखाला साथ देण्यासाठी, एकमेकांना आधार देण्यासाठी नवऱ्यासारखा जवळचा मित्र दुसरा कुणीच नसतो 

“पण हा विचार मुलांनी पण करायला हवाय. “अधिरानी अधिरपणे, मुद्दा मांडला.  तिला साथ देताना मी म्हणाले, ” अर्थातच संसार दोघांचा आहे तडजोड हा कानमंत्र दोघांनीही सांभाळायला हवा.  फक्त दुसऱ्याकडून अपेक्षा न ठेवता सुवर्णमध्य साधावा लागतो.  तरच आयुष्याचं गणित सोप्प होतं.  तुम्हाला सल्ला देताना, विचारांच्या दोन टोकांची जुळवणी करताना आम्ही पण सगळ्या बाजूने विचार करायला हवा हे मान्य आहे मला.  पुढच्या वेळी आपण मुलांना आणि त्यांच्या पालकांना पण बोलवूया.  म्हणजे त्यांचेही विचार आपल्याला कळतील. ” माझ्या विचारांच स्वागत झालं आणि भरभरून होकार मिळाला.  

वेळ संपत आली. मुलींच्या चेहऱ्यावर सकारात्मक विचारचक्र सुरू झाली होती.  ती बघून आई-वडिलांच्या चेहऱ्यावर सोनाराकडून कान टोचले गेल्यामुळे समाधान दिसत होतं.  मलाही, हा आगळावेगळा मेळावा घेतल्याचा आनंद झाला.  सामंज्यसतेचा निम्मा गड तर, ‘सर’ झाला होता. आता लवकरच मला वधू पालक मेळाव्याच्या ह्या मैत्रीमुळे मुला मुलींच्या विचारात नक्कीच बदल होईल आणि लवकरच त्यांच्या लग्नाची आमंत्रणे येतील अशी आशा करते.

तर मैत्रिणींनो आता भेटूया पुढच्या मेळाव्यात. तोपर्यंत तुम्हाला राम राम..  जय श्री साई राम 

© सौ राधिका -माजगावकर- पंडित

पुणे – 51  

मो. 8451027554

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित / मंजुषा मुळे/ गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares