मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ गोष्ट स्नेहाची ☆ डॉ. ज्योती गोडबोले

डॉ. ज्योती गोडबोले

? मनमंजुषेतून ?

☆ गोष्ट स्नेहाची डॉ. ज्योती गोडबोले ☆ 

दवाखाना अगदी बंद करताना, स्नेहा घाईघाईने आली .

” मावशी, सॉरी हं जरा उशीर  झााला, पण थोडे बोलायचे होते.”

” अग बोल ना, काय आहे  प्रॉब्लेम.” 

” कुठून सुरवात करू, तेच समजत नाहीये मला….  तुम्हाला तर माहित आहे, मी सॉफ्टवेअर इंजिनिअर आहे, माझी जायची वेळ नक्की, पण यायची कधीच लवकर नसते हो. फार धावपळ होते माझी. तरीही, होईल ते सगळं करत असते मी.  आत्ताच प्रमोशन झालं आणि पगारही छान वाढला माझा. पण कसं सांगू , माझी मुलं सासूबाई सांभाळतात.  खूप मायाही करतात, लक्ष देतात मुलांवर.  पण परवा मी सहज भाजी केली तर अमोल म्हणाला,’ शी ! आजीसारखी नाही झाली भाजी.  मला नको ही डब्यात.’ — असं अनेक वेळा झालंय, पण मी दुर्लक्ष केलं ! पण हल्ली हे वरचेवर व्हायला लागलंय.  मुलांना माझ्या कष्टाची किंमत वाटत  नाही, असं वाटतं मला.  बघा ना, माझ्या कंपनीतून कर्ज काढून, हे मोठं घर आम्ही घेऊ शकलो. दोघं कमावतो, म्हणून हे शक्य झालंय ना ! पण– मुलं मला असं बोलली तर सासूबाईंना सूक्ष्म आनंदच होतो.  त्या त्यांना रागवत नाहीतच. शिवाय, ‘ आई, आजी कित्ती कामं करते घरात. तू तर फक्त ऑफिस मध्ये जातेस ‘  असंही अबोली म्हणाली मला. लहान आहेत अजून मुले, पण मला हे खूप लागले.— मला हा तिढा कसा सोडवावा हे समजतच नाहीये.  माझा नवरा यात काहीच बोलत नाही. मी इतकी दमते हो, की मला भांडायची शक्तीच उरत नाही…  मला आता हे सगळं झेपेनासे झालंय !  तुम्हीच सांगा ना आता काहीतरी उपाय !” — एका दमात एवढं सगळं बोलली ती . 

” स्नेहा, तुझी आई काय म्हणली यावर ?”

” ती म्हणाली, तू लक्ष देऊ नको ग.  करतात ना त्या सगळं, मग घे थोडं ऐकून. ” 

” अहो, त्यांना बाई ठेवलेली चालत नाही. कुरकुर करून देतात घालवून.  म्हणतात, 

‘ आम्हाला बाईच्या पोळ्या आवडत नाहीत. ‘ मला नाही जमत हो पोळ्या करून मग ऑफिसला ७ लाच जायला. ” 

” हे बघ स्नेहा, अजिबात रडू नकोस.  एवढी हुषार आणि गुणी मुलगी तू , अशी खचून जाऊ नकोस. हे बघ. मी सांगते ते ऐकशील का? रविवारी सुट्टी असते ना तुला, तर सगळ्यांना एकत्र बोलाव.  त्या आधीच, तुमच्या सोसायटी मधली चांगली बाई शोधून, तिला पक्की करून ठेव.  आहे का अशी कोणी ? ” 

” अहो एक मावशी आहे ना, पण सासूबाई नको म्हणतात. “

” ते सोड ग !– तर त्या बाईला भरपूर पगार कबूल कर आणि बोलवायला लाग. त्या आधी मिटिंग घे घरात. गोड शब्दात, सासूबाईंना सांग–‘ तुम्हाला खूप काम पडतं आणि आता तर मला आणखी उशीर होईल,  म्हणून मी या बाई बोलावल्या आहेत. या सर्व स्वयंपाक उत्तम करतील. समोरच्या गोगटे मावशींकडे त्याच करतात. मी चौकशी केलीय, असेही सांग.आणि हो,  मुलांना, त्यांच्या समोरच सांग,’ हे बघा, आजीला खूप काम पडतं की नाही, मग आपण त्रास नाही द्यायचा आजीला– उलट तिचा त्रास कमी करायचा . . आणि मी नोकरी आपल्या घरासाठीच करते ना , मग मी नाही सतत घरात राहू शकत. ” 

“बरं. मी खरं तर मुलांना आधीपासूनच असं  समजावत होते की , ‘ तुम्हा दोघांनाही  मागच्या महिन्यात ट्रेकला पाठवले.  तेव्हा शेजारच्या सुबोधला त्याचे आई बाबा पाठवू शकले नाहीत. ते का?  तर तेवढे पैसे ते देऊ शकणार नव्हते, हो ना अमोल? ‘ –त्यावर तो असही म्हणाला की, ‘ हो आई ! सुबोध म्हणाला सुद्धा मला की , ‘तुझी मज्जा आहे, तुझी आई पण नोकरी करते. माझे बाबा म्हणाले,  एवढे पैसे मी नाही देऊ शकत तुला.  एकट्याच्या पगारात नाही भागत बाबा.’ —मी लगेच तो धागा पकडत त्याला म्हटलं होतं की,  ‘ बघ अमोल, हे पटले ना तुला ! मग आता, आपण आजीचा भार हलका करूया. त्यासाठी आता  लीलामावशी येईल आपल्या कडे कामाला, चालेल ना ?’ — यावर मात्र तेव्हा तो काहीच बोलला नाही. “

” हे बघ स्नेहा, तू हे करून बघ.  सासूबाईंना जरा राग येईल, पण त्यांनाही मोकळीक मिळेल ग. 

आणि हो , त्यांना दरमहा पॉकेट मनी देत जा. सगळे आयुष्य कष्टात गेलेय त्यांचे…. मग बघ   चित्र कसे बदलेल ! आणि दोन वर्षातून एकदा, कुठे तरी चांगल्या कंपनी बरोबर ट्रीपलाही पाठव दोघांना. ” 

स्नेहाल बहुदा पटलं असावं. ती निघून गेली—-

—–चार महिन्यांनी ती हसत हसतच आली, आणि माझ्या हातात एक छान परफ्युमची बाटली ठेवली.

” अग हे काय, आणि कशाला?”

” सांगते ना मावशी. तुमचा सल्ला अगदी रामबाण ठरला हो. मी अगदी असेच केले.

आता तर सासूबाई इतक्या खूष असतात. पहिल्यांदा, लीलाबाईंशी उभा दावा होता. पण हळूहळू, आवडायला लागला त्यांचा स्वयंपाक ! शिवाय, मी एक मुलगीही ठेवलीय वरकाम करायला. सगळे करते ती, म्हणून घरही छान राहते. आणि सासूबाईंचीही चिडचिड होत नाही. आता तर लीला बाईंशी गट्टीच जमलीय.  तुम्ही सांगितल्या प्रमाणे, मी त्यांच्या हातात पैसे ठेवले, तर म्हणाल्या मला, ‘ कशाला ग? ‘–म्हटले अहो घ्या, सासूबाई. खूप केलेत कष्ट, आता करा खर्च मनासारखा. मावशी, हे ऐकून डोळ्यात पाणी आले हो त्यांच्या. म्हणाल्या, ‘ बाई ग. कोणीही नाही ग मला असा पॉकेट मनी दिला कधी ‘.—आता आमचे घर एकदम खूष आहे. पोरेही आता म्हणतात , ‘ आज्जी, तू आणि आजोबा जा भेळ खायला. मज्जा करा.’–मावशी, तुम्ही किती मस्त सल्ला दिलात.” —

—गोष्टी छोट्या असतात, पण लक्षातच येत नाहीत आमच्या. —

स्नेहाने मला मिठी मारली. म्हणाली, ” खूप छान सल्ला दिलात आणि माझा संसार मला परत मिळाला. नाहीतर मी खरोखरच चालले होते हो डिप्रेशन मध्ये. पण आता सगळे मस्त आहे. ”  

–आणि माझे आभार मानून स्नेहा गेली.

—-बघा ना, छोट्याशाच गोष्टी, पण अमलात आणल्या, की सुखाच्या होतात !

स्नेहाची साठा उत्तरी कहाणी सुफळ झाली. 

© डॉ. ज्योती गोडबोले 

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – क्षण सृजनाचा ☆ आठवणीतला हळदुल्या ☆ सुश्री तृप्ती कुलकर्णी

सुश्री तृप्ती कुलकर्णी

अल्प परिचय
ग्राफिक डिझायनर आणि साहित्यिक सल्लागार, पुणे

☆ क्षण सृजनाचा ☆ आठवणीतला हळदुल्या ☆ सुश्री तृप्ती कुलकर्णी ☆ 

काही दिवसांपूर्वी एक हळदुल्या रंगाचा पक्षी आमच्या बाल्कनीत येऊन छानपैकी गोडगोड शिळ वाजवत बसायचा. अगदी नेमानं ठरल्यावेळी यायचा, गाणं गायचा आणि जायचा. बऱ्याचदा मी तेव्हा वाचत बसलेली असायचे. पण त्याचं गाणं सुरु झालं की माझं वाचन थांबायचं आणि नकळत त्याच्याबद्दल विचार चालू व्हायचे…  तो इथंच का येतो…  कुणासाठी येतो…  बरं आला तर त्याच्यासाठी  टाकलेले दाणेही खायचा नाही. नुसताच फाद्यांवर झोके घेत बसायचा आणि गाऊन निघून जायचा. 

माझ्या चाहूलीने त्याची गानसमाधी भंग पावू नये म्हणून मी तिथं जाऊन त्याचा फोटो काढण्याचा आणि  व्हिडिओ करण्याचा मोह टाळला. फक्त एकदाच हळूच दाराच्या फटीतून त्याची ओझरती झलक पाहिली. अतिशय सुंदर तेजस्वी असा पिवळा रंग पटकन नजरेत भरला. पक्षी चिमुकला खरा पण सौंदर्य केवढं! अजून जवळ जाण्याचा प्रयत्न केला पण तेवढ्या चाहुलीने तो उडाला आणि दूर लपून बसला. जेव्हा मी दार बंद करून माझ्या जागेवर येऊन बसले तेव्हा तो परत फांदीवर येऊन बसून गाऊ लागला. 

मग मी काही मिनिटांचं त्यांचं असणं फक्त अनुभवायचं ठरवलं. त्याची गाण्यामागची आंतरिक उर्मी काय असेल याचा विचारही मी सोडून दिला. डोळे बंद करून फक्त ऐकत राहिले. त्या सुरांचा कानोसा घेत राहिले. 

हळूहळू मनातच त्या गाण्यात कुठले शब्द बसतील, ते सूर विरहाचे की आनंदाचे, तो पक्षी पूर्णपणे कसा दिसत असेल अशी कल्पना चित्रं रंगवायला लागले. रोज पंधरा-वीस मिनिटं मी मनातल्या मनात रानावनात जाऊन वेगवेगळ्या पिवळ्या रंगाच्या पक्षांचा शोध घ्यायला लागले‌. उगाचच, काही कारण नसताना‌… ती पंधरा मिनिटं मला हिरव्या-पिवळ्या रंगाची वेगळीच दुनिया दाखवणारी ठरली. कधी प्रत्यक्षात बघितलेले झाडांच्या दाटीवाटीत बसलेले पक्षी, कधी चित्रपटातले, तर कधी इंटरनेटवर बघितलेले व्हिडिओ त्यातले सगळे फक्त पिवळ्या रंगाचे पक्षी आठवण्याचा प्रयत्न करू लागले. आणि काय गंमत, हे आठवताना फक्त पक्षीच नव्हे तर कितीतरी वेळा नदीचा काठ, निळं आकाश, रंगीत फुलं, हिरव्यागार फांद्या असंही काहीबाही दिसू लागलं. अर्थातच खूप छान निवांत असं वाटत होतं. मग मी माझ्या या अवस्थेला एक नाव देऊन टाकलं… ‘हळदुली समाधी’.   

आणि मग काही दिवसांनी तो यायचा अचानकच बंद झाला. सुरुवातीला दोन-तीन दिवस थोडी हूरहूर वाटली पण मग ठरवलं याला आठवणीत बंदिस्त करावा आणि म्हणूनच त्या पक्षाने मला काय काय दाखवलं ते मी या कवितेत मांडलं——-

हळदुल्या…

एय, हळदुल्या रंगाच्या पक्ष्या 

आमच्या अंगणात येऊन 

तू नेहमी नेहमी गातोस काय

खरं सांग, हळदुल्या तुझं आमचं नातं काय

 

शेवंतीच्या फांदीवर बसून मस्त झोके घेतोस 

हिरव्या हिरव्या पानांशी दंगामस्ती करतोस

खरं सांग कशासाठी, कोणासाठी तू इथं येतोस 

आणि इतकं गोड गाणं पुन्हा पुन्हा गातोस

खरं सांग हळदुल्या…

 

दवं भरलेल्या झाडांना आताशी जाग येते आहे

इवल्या इवल्या फुला-पानांवर ऊन कसं डुलतं आहे 

इतका उंच उडतोस तरी तुला दिसत नाही काय

चमचमत्या चांदण्याचाही अजून निघेना इथून पाय 

खरं सांग हळदुल्या… 

 

असा कसा तू आगंतुकपणे उडत उडत येतोस 

इथल्या पानाफुलांशी आपलं नातं जोडतोस 

इथल्या मऊ मातीशी कसलं हितगूज करतोस

तुझ्या गोड गाण्यासाठी सूर तिचे घेतोस काय 

खरं सांग हळदुल्या… 

 

जाईजुईचा वेल कसा वर वर चढतो आहे

चाफ्याच्या फुलाशी खूप गप्पा मारतो आहे

गुलाबाच्या कळीला खोल खळी पडली आहे

एक भुंगा कसा बघ तिच्याभोवती फिरतो आहे

खरं सांग हळदुल्या… 

 

उंच उंच फिरण्याची तुला कित्ती कित्ती हौस 

पण मातीत खेळणाऱ्या पानांची करतोस भारी मौज 

त्यांचा पिवळा रंग पिऊन तु पिवळा होतोस काय 

खरं सांग हळदुल्या– तुझं आमचं नातं काय

आमच्या अंगणात येऊन तू नेहमी नेहमी गातोस काय——-

 

©  सुश्री तृप्ती कुलकर्णी

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ कैलासाहून पृथ्वीवर गणेशआगमन.. ☆ सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे

सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे

☆ विविधा ☆ कैलासाहून पृथ्वीवर गणेश आगमन.. ☆ सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे ☆

आज कैलासावर अगदी लगबग चालली होती! गणपती बाप्पा दहा दिवसासाठी पृथ्वीतलावर जाणार होते. त्यातच आज पार्वती चा उपवास! अगदी कडकडीत! बारा वर्षे रुईची पाने चाटून, वनात राहून, तपश्चर्या करून तिने शंकराला प्राप्त करून घेतले होते.

हिमालयाने, तिच्या पित्याने स्वर्गातील उत्तमोत्तम स्थळं सुचवली असतील तिला!पण हा भोळा शंकर तिच्या मनी वसला होता! त्यासाठी  तिने उग्र तपश्चर्या करून शंकराची मर्जी संपादन करून घेतली होती.कैलासावर त्यांचे सुखाचे राज्य चालले होते.

कार्तिकेयाच्या जन्मानंतर सुखावले. दुसऱ्या बाळाची चाहूल लागताच पार्वती आणखीच आनंदली! या बाळाच्या जन्माच्या खूप आख्यायिका आहेत.कोणी म्हणतं, घामाच्या मळापासून गणराया ची निर्मिती झाली. गणरायाला हत्तीचे तोंड कसे मिळाले याची कथा वेगळीच आहे, एकदा पार्वती माता स्नान गृहात होत्या. त्यांनी गणपतीला दारात बसवून ठेवले होते आणि कुणाला हि आत पाठवू नको,  असे त्याला सांगितले होते. अचानक शंकराची स्वारी आली पण गणपती काही त्यांना आत सोडेना! तेव्हा क्रोधाविष्ट झालेल्या शंकराने त्याचे मस्तक उडवले. मग पार्वतीने खूप शोक केला, तेव्हा शंकरांनी तिला गणपतीला पुन्हा त्याचे मुख आणून देतो असे आश्वासन दिले! दुसऱ्या दिवशी जो कोणी शंकराच्या दृष्टीस प्रथम पडेल ते मुख आणायचे ठरले. ठरल्याप्रमाणे सकाळी शंकराची स्वारी बाहेर पडली, तेव्हा त्यांना पहिले दर्शन हत्तीचे झाले. मग काय! शंकरांनी त्याचा वध करून ते मुख घरी आणले आणि गणपतीला बसवले. तेव्हापासून गणपती बाप्पाला हत्तीचे तोंड मिळाले. आणि छातीवर सोंड ठेवणारा, सुपाएवढे कान असणारा असा गणपती बाप्पा आपल्या डोळ्यासमोर उभा राहिला. तोच वक्रतुंड महाकाय असा गणपती बाप्पा आपल्याला पूजनीय झाला.

  या गणपतीला सर्वांच्यात मिसळून राहण्याची फार हौस! कैलासावर कंटाळा आला म्हणून पृथ्वीवर माणसांबरोबर राहायला येतो तो दहा दिवस! पार्वती माता काळजीने सांगते,’ हे भूक लाडू घेऊन जा. लवकर परत ये. तिथेच रमून राहू नकोस. तुझ्या उंदरासाठी सुद्धा मी खाऊ देते!

त्याची काळजी घे. आधीच हरितालिका व्रत करून पार्वतीदेवी थकलेली असते.तरी ती  गणपतीला लाडू करून देते! कार्तिकेयाला ही गणपती जाणार, म्हणून वाईट वाटत असते. तो गणपतीला म्हणतो,’ कसा रे जाणार तू एवढ्याशा उंदरावरून?’ पण गणपती त्याच्या त्या छोट्याशा वाहनावरून जायला सिद्ध झालेला असतो. शंकरबाबा गणपतीला सांगतात,’ तिकडे फार मोदक खात बसू नकोस! लवकर परत ये.’त्या सर्वांना गणपतीला सोडताना फार वाईट वाटत असते.

तर इकडे पृथ्वीवर धूम धडाका चालू असतो, गणरायाच्या आगमनाच्या तयारीचा! आरास, महिरपी, वेगवेगळ्या प्रकारचे लाइटिंग अशी सगळी तयारी चालू असते. स्त्रिया गणपतीच्या स्वागतासाठी सज्ज असतात. गणपती पाहुणा येणार असल्यामुळे त्याच्यासाठी खिरापत, मोदका ची तयारी होते. नवीन वस्त्रे, दागिने यांनी बाजारपेठ सजते. लोक उत्साहाने तयारी करतात. घरातील वातावरण उत्साहाने  भरलेले असते. मुलांना मोदकाचे वेध लागलेले असतात. आरत्या म्हणायच्या असतात. गणपती पाहुणा येणार म्हणून दारात रांगोळी काढली जाते, तोरणं लावली जातात, गणरायासाठी वेगळाच थाट! त्याला कुठे बसवू या, त्याचे स्वागत कसे करूया, या विचारात फुलांच्या, लाईटच्या, कागदांच्या, रंगीबेरंगी माळा व दिवे लावले जातात. तो हा हरितालिकेचा दिवस असतो.

जणू पार्वती आधी पृथ्वी वर येऊन त्याच्या स्वागताची सर्व तयारी झाली आहे ना घरोघरी, ते पाहून जाते! उद्या ती त्याची आई म्हणून मिरवणारे असते, तर दोन दिवसांनी तीच गौरी बनून माहेरवाशीण म्हणून येणार असते.ही दोन्हीही नाती प्रेमाची असतात! दोन्ही नात्यात तिचे हे रूप मनोहर दिसते! तोच उत्साह निसर्गातही दिसून येतो.पावसाच्या सरी वर सरी येत रहातात आणि वातावरणात प्रसन्नता आणतात.

गणरायाचे आगमन होताच सगळीकडे आनंदीआनंद पसरतो.

कैलासा वरून पृथ्वीवर आणि आपल्या घरात! उंदराच्या वहानावरून! उद्या बाप्पा ला मोदकाचे जेवण मिळणार!

आणि रोज आरती प्रसादाने आसमंत जागा रहाणार!

संकटनाशक गणपती सौख्याची, आरोग्यदायी नवी लाट घेऊन येणार आहे, म्हणून गर्जू या,

  ? गणपती बाप्पा मोरया! ?

© सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆  स्टोव्ह ☆ संग्रहिका – सुश्री आनंदी केळकर

?इंद्रधनुष्य? 

☆ स्टोव्ह  ☆ संग्रहिका – सुश्री आनंदी केळकर ☆ 

स्टोव्ह मध्ये राॅकेल भरायला नरसाळे, पत्र्याची नळी असलेला पंप,पुढे काही वर्षांनी प्लॅस्टिकचा फुग्याचा व काॅक असलेला पंप आल्यावरचा आनंद विसरणे शक्य आहे का ? 

जमिनीवर थोडेफार सांडलेल्या राॅकेलचा वास अजूनही चांगला आठवतो आहे.

स्वयंपाक करताना अन्नाला राॅकेलचा वास येऊ नये म्हणून घेतलेली काळजी.

आईचे आपल्या कुटुंबावर किती प्रेम आहे, हे आता जाणवते.

स्टोव्ह पेटवण्यासाठी काकडा व तो बुडवण्यासाठी बिटको काला दंत मंजन च्या छोट्या रिकाम्या झालेल्या काचेच्या बाटलीत राॅकेल भरून ठेवायचे. 

काडेपेटी व ती ठेवण्यासाठी हिंगाची रिकामी झालेली पत्र्याची डबी असा सगळा थाट असायचा. 

पीन करणे एक कौशल्याचे काम होते. हात अगदी सरळ धरून. पीन वाकडी होणार नाही याची काळजी घ्यावी लागत असे जर पीन निपलमधे तुटली तर सगळाच खोळंबा व्हायचा. त्याकरीता निप्पल पाना, सायकलची तार, कातडी वायसर इत्यादी हत्यारे घरीच ठेवलेली असायची. 

स्टोव्हची टाकी गळत असेल तर तिथे लावण्यासाठी  501 नं.चा साबण बार. 

स्टोव्ह बिघडल्यावर घरातली होणारी चिडचिड तर विचारूच नका आणि दुरूस्त करून आणल्यावर आईची प्रसन्न मुद्रा, ओसंडून वाहणारा आनंद पाहिला की घरातली माणसे अगदी खूष व्हायची. 

स्वयंपाक झाल्यावर आईने सोडलेला सुस्कारा जितका मनाला शांत करतो ना अगदी तसाच शांतपणा स्टोव्हची चावी सोडल्यावर येणारा स्सूsssssss आवाजही खूप मनाला प्रसन्न करणारा होता.

मित्रांनो कोणाकोणाच्या आठवणी जाग्या झाल्या?

 

संग्रहिका – सुश्री आनंदी केळकर 

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ आजचा दिवस,आपला दिवस ☆ सौ. स्वाती रामचंद्र कोरे

सौ. स्वाती रामचंद्र कोरे

? वाचताना वेचलेले ?

☆ आजचा दिवस,आपला दिवस ☆ सौ. स्वाती रामचंद्र कोरे ☆

काय करावे, एक करायला गेलं तर एक राहूनच जातं.

सकाळी फिरायला गेलं तर दुलईत गुरफटून झोपायचं सुख निसटतं.

शांततेने पेपर वाचू लागलो तर पूजा, प्राणायाम राहून जाते.

दोन्ही साधायचा प्रयत्न केला  तर नाश्ताच राहून जातो,

धावपळ करत सगळं केले तर आनंद हरवतो.

डायट फूड मिळमिळीत लागतं, चमचमीत खाल्ले तर वजन वाढतं.

एक करायला गेलं तर एक राहूनच जातं.

सिरीयल पहायची तर स्वयंपाक राहतो, स्वयंपाक घरात रमलो तर सिरीयल पहायची राहते.

नोकरीसाठी कुटुंब सोडायचं नाही पण कुटुंबासाठी नोकरी हवी दोन्ही सोडायच्या कल्पनेचे भय वाटायला लागतं.

लोकांचा विचार करता करता मन दुखावत, मनासारखा वागायला गेलं तर लोक दुखावतात.

एक करायला गेलो की एक राहूनच जातं.

घाईगडबडीने निघालो तर सामान विसरतो,  सावकाश गेलो तर गाडी सुटायची भीती.

सुखात असलो की दुःख संपत आणि दुःखात असलो की सुख जवळ फिरकत नाही.

एक करायला गेलो की एक राहूनच जातं.

पण या काहीतरी राहून जाण्यातच खरं जीवन आहे. काहीतरी मिळाल्याचे समाधान आहे.

कारण बाळ जन्मल्याबरोबर त्याच्या रडण्यात आनंद आहे. आणि अचानक दुरावलेली व्यक्ती कित्येक वर्षांनी भेटल्यावर आनंदातही रडणे आहे.

कधी रडण्यातही आनंद मिळतो तर कधी आनंदातही रडता येतं.

ज्याला या कुठल्याच गोष्टीचे काही विशेष वाटत नाही तो माणूस नाही तर यंत्रच आहे.

      म्हणून

आनंदाने भरभरून जगून घेऊ या.

आजचा दिवस आहे तो  आपला आहे.

 बघा, पटलं ना..!

 

संग्रहिका –  सौ. स्वाती रामचंद्र कोरे

खानापूर,जिल्हा सांगली

मो.9096818972

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆  गणपती बाप्पा मोरया …. ☆ सौ. श्रेया सुनील दिवेकर

☆ विविधा ☆ ?️ गणपती बाप्पा मोरया …. ?️☆ सौ. श्रेया सुनील दिवेकर ☆ 

गणपती बाप्पा मोरया….

मोरया… चा जयघोष करत ढोल, ताशे, झांज, लेझीम च्या गजरात आगमन व्हायचे आमच्या गल्लीतल्या बाप्पाचे. पालखीत बसून सोवळ्यांने, गणपती बाप्पा मोरया असा जयघोष करत आगमन होत असे ह्या विघ्नहर्त्याचे. आम्ही सगळी मुलं त्या पालखी मागून चालत गणरायाला आणायला जात असू. गणपती बाप्पाचे

आगमन एका देवळात होत असे जिथे तो पुढे अकरा दिवस विराजमान होत असे. दररोज दोन वेळा, वेळेवर आरती होत असे आणि ती सर्वांनाच पाठ असल्यामुळे ती एका सुरात आणि एकाच लईतही होत असे.

आम्ही जसा गल्लीतला तसाच घरचा गणपती आणायला सुद्धा दर वर्षी बाबांबरोबर जात असू. आमची मूर्ती ठरलेली असायची. मध्यम आकाराची, पिवळे पीतांबर आणि केशरी शेला परिधान केलेली ,हिरे जडीत मुकुट असलेली, सुंदर बोलके डोळे आणि चेहर्‍यावर शांत, शीतल, तृप्त असे भाव, एका हातात मोदक आणि दुसर्‍या हातात कमळ. बरोबर मुषक हवेतच. मूर्ती बघून मनं कसं प्रसन्न होतं असे.

घरी आई आरतीचे ताम्हन घेऊन वाट पहात असायची ह्या एकदंताची. आम्ही पोहोचताच तिच्या चेहर्‍यावरचा भाव अगदी पाहण्या सारखा असायचा. प्रसन्न मनाने ती बाप्पाला ओवाळायची आणि आमचे बाप्पा विराजमान व्हायचे आम्ही त्यांच्या साठी केलेल्या खास आसनावर.

हे दिवस मात्र आमच्यासाठी खास असायचे कारण एक तर गणपती बाप्पा असे पर्यंत आईचा मूड एकदम झकास असायचा आणि रोज गोडाधोडाचे खायला मिळायचे. त्यात उकडीचे मोदक म्हणजे आहाहा.. बाप्पाला आणि आम्हालाही परम प्रिय. न चुकता आरती, अभिषेक, नैवेद्य अथर्वशीर्षाचे पठण व्हायचे. एकूणच वातावरण प्रसन्न आणि अल्हाददायक असायचे. पाचवे दिवशी घरी गौर यायची. त्या दिवशी आई खूप खुश असायची जणू तिचीच लेक आली आहे माहेरी. माहेरवाशीणी साठी पुरण पोळी ठरलेली.

हे अकरा दिवस कसे भुर्रकन उडून जायचे. आणि बघता बघता बाप्पाला निरोप द्यायचा दिवस यायचा. आमचा नावडता दिवसं त्या दिवशी सगळेच उदास असायचे. हा पाहुणा आपल्या घरी आता परत जाणार म्हणून खूप वाईट वाटायचे. आज आरती विशेष व्हायची. आईचे नेत्र भरून यायचे.पण काय करणार काहीच इलाज नसायचा. शेवटच्या दिवशी आम्ही सगळे देखावे बघायला जायचो. इतके सुंदर सुंदर देखावे असायचे आणि अनंत चतुर्दशी दिवशी भव्य मिरवणुका असायच्या. रात्रभर आम्ही मिरवणुका बघायचो आणि पहाटे परत यायचो.

आज मिरवणूक पहायला गेले होते गणपतीची आणि आनंद होण्या ऐवजी दुःखच झाले. समोरचं दृश्य पाहून कळेच ना नक्की कशाची मिरवणूक आहे ते. भक्तीगीतं भावगीतं कानी पडायच्या ऐवजी फास्ट ट्रॅक च्या गाण्यावर, धांगडधींगा चालू होता. दारूच्या नशेत बेधुंद होऊन गणपती बाप्पा समोर तरुण पिढी नाचताना पाहून खूप दुःख झाले. त्यांची त्यांनाही शुद्ध नव्हती. चुरमुऱ्यांची उधळण करत ती पायदळी तुडवत मिरवणूक चालली होती.

ते कमी म्हणून फटाकड्यांच्या धुराने सगळे वातावरण दूषित केले होते. मला प्रश्न पडला त्या विघ्नहर्त्याला तरी श्वास घेता येत असेल का ह्या धुरात?? ते दूषित वातावरण आणि कर्ण बधीर करणारा तो बॅंजो चा आवाज ऐकून परत यावं असं वाटत तरी असेल का त्या गणरायाला ?

टिळकांनी सार्वजनिक गणेशोत्सवाची संकल्पना राबविली होती ती समाजाला संघटीत करण्याच्या उद्देशाने. आज त्यांनी जर हे अस दृश्य पाहिलं असत तर बहुतेक बेधुंद होऊन नाचणार्‍यांच्याच कंबरेतला पट्टा काढून चांगलं फोडून काढलं असत एकेकाला.

मित्रांनो जरा विचार करा आपण बदलू शकू का हे दृश्य?? राजकारणी लोकं आपलं पद आणि पैसा दाखवण्यासाठी एका गल्लीत तीन तीन गणपती बसवतात. नाही नाही तितकी श्रध्दा आहे म्हणून नव्हे तर माझा मंडप तुझ्या पेक्षा भारी हे दाखवण्यासाठी. मी किती किलोचे चांदीचे दागिने केले आहेत ह्या वर्षी ह्यासाठी,सत्तेसाठी.

आपण सगळे जर एकत्र आलो तर हे नक्की थांबवू शकू. एका गल्लीत एकच गणपती निदान एवढी तरी सुरवात करू शकू. बँजो वर नाचण्या ऐवजी सनई चौघडे, लेझीम आणि ढोलाच्या ठेक्यात बाप्पाला निरोप देऊ शकू. नशेत बेधुंद न होता भक्तीत तल्लीन होऊ शकू. चुरमुऱ्यांची उधळण करण्या पेक्षा तेच गोरगरिबांना वाटू शकू.

असं काही तरी करू की आपल्या पेक्षा जास्त गणराया वाट बघेल पुढच्या वर्षी येण्याची.

सहज मनाच्या कोपऱ्यातून ?

गणपती बाप्पा मोरया…

 

©  सौ. श्रेया सुनील दिवेकर

मो 9423566278

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ आमची वैदेही…. ☆ सौ. मेधा सहस्रबुद्धे

? मनमंजुषेतून ?

☆ आमची वैदेही…. ☆ सौ. मेधा सहस्रबुद्धे ☆ 

नुकतीच श्रीकृष्ण जन्माष्टमी झाली.. हा भारतभरात मोठ्या उत्साहात साजरा होणारा सण! आणि आमच्या घरातही.. जन्मष्टमी म्हणजे “श्रीकृष्णाचा हॅप्पा” (हॅप्पी बर्थडे) म्हणून सकाळीच वैदेहीने तिच्या या “मित्राच्या” पूजेची तयारी केली.. सकाळीच देवासमोर बसून आपल्या लाडक्या श्रीकृष्णाला “जन्मदिनमिदं…” म्हणून शुभेच्छा दिल्या, आणि मग घरातील देव्हाऱ्या व्यतिरिक्त असलेले बाळकृष्ण/श्रीकृष्ण गोळा करून देव्हाऱ्याशेजारी आपला वेगळा पाट मांडला, आणि आजोबांच्या बरोबर आमचीपण जन्माष्टमीची पूजा संपन्न झाली! (त्यात “दिवसभर सॉफ्ट कृष्ण सुद्धा हलवायचा नाही हं पूजेतून, आजी!” अशी मला दटावणी पण झाली)

साक्षात भगवंताचा हॅप्पा साजरा करणारी ही “सहज भक्ती” सर्वांनाच मिळावी हीच त्या श्रीकृष्ण परमात्म्याच्या चरणी आज जन्माष्टमी निमित्त प्रार्थना!

 

सौ. मेधा सहस्रबुद्धे

पुणे

मो  9420861468

medhasahasrabuddhe@gmail.com

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ गणेशोत्सवाचे बदलते स्वरुप ☆ सुश्री प्रज्ञा मिरासदार

☆ विविधा ☆ ?️गणेशोत्सवाचे बदलते स्वरुप?️ ☆ सुश्री प्रज्ञा मिरासदार ☆

लोकमान्यांनी गणेशोत्सव सुरू केला त्याला शतक सरूनही अनेक वर्षे लोटली. त्या काळात ती एक गरज होती. स्वातंत्र्य मिळवण्यासाठी जनमत तयार करणे अत्यावश्यक होते. त्यासाठी स्वदेशी लोकांनी एकत्र येऊन विचारांची देवाणघेवाण करणे हेही गरजेचे होते. गणपती आणि शिवाजी महाराज ही महाराष्ट्राची दोन दैवते! आणि त्यांच्या निमित्ताने लोक एकत्र येऊ शकतात हे लोकमान्यांनी ताडले होते. म्हणून त्यांनी गणेशोत्सव व शिवजयंती उत्सवाला सार्वजनिक स्वरूप दिले. त्याचा फार चांगला परिणाम दिसून आला. लोक एकत्र येऊ लागले. लोकमान्यांचा हेतू साध्य झाला. त्यांच्या मृत्यूनंतर सुद्धा हे दोन्ही उत्सव सातत्याने सुरूच राहिले.इंग्रजांना या धार्मिक भावनेत ढवळाढवळ करणे अशक्य झाले. परिणामी गणेशोत्सव महाराष्ट्रात तरी मोठ्या प्रमाणात सुरूच राहिला.

हे लोण नंतर सर्व देशभर पसरले. महाराष्ट्रातील गावोगावी गणेशोत्सव मंडळे स्थापन करण्यात आली. पुण्यात, मुंबईत तर शतक लोटलेली अनेक गणेशोत्सव मंडळे आहेत. दरवर्षी चढत्या क्रमाने गणेशोत्सव थाटात साजरा केला जातो.

स्वातंत्र्य प्राप्ती पर्यंत  हे सगळे ठीक होते. नियमितपणे गणेशोत्सव शांततेत पार पडायचा.  पण गेली साठ सत्तर वर्षे  त्यात चढाओढ सुरू झाली. विजेची झगमगाट असणारी रोषणाई, हिडीस गाणी, मोठ्ठे लाऊड स्पीकर या गोष्टीचा अतिरेक झाला. त्यासाठी लागणारी वर्गणी ( काही वेळा जबरदस्तीने) गोळा केली जाऊ लागली. गणपती म्हटलं की लोक वर्गणी देतच होते.

नंतरच्या काळात तर या शांततेची जागा गडबड, गोंधळ, हुल्लडबाजीने कधी घेतली ते कळलेच नाही. लोकमान्यांचा मूळ उद्देश कधीच सफल झाला होता. आता गणेशोत्सवाच्या नावाखाली अहमहमिका, स्पर्धा, नाचगाणी सुरू झाली. मध्यंतरीच्या काळात तर सिनेमातली गाणी  स्पीकरवर लावून त्यावर हिडीस अंगविक्षेप करत नाचणे ही फॅशन झाली. हे प्रकार फार वाढले.

एकेका गावात अनेक गणेशोत्सव मंडळे आपापल्या मंडळातर्फे गणेशोत्सव साजरा करतात. पुण्यात मुंबईत तर गल्लोगल्लीत  गणपतीचे मंडप उभारले जातात. वाहतुकीचा बोजवारा उडतो.आणि विसर्जन मिरवणुकीचे तर विचारायलाच नको. रात्र रात्र मिरवणूका निघतात. त्यात धार्मिक भावना कमी आणि दिखाव्यालाच जास्त महत्त्व दिले जाते. हे कितपत योग्य आहे? हे दहा दिवस कायदा, सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिसांवर प्रचंड ताण पडतो.हेही लक्षात घ्यायला हवे.

हे सगळे बदलायला पाहिजे हे आता हळूहळू लक्षात येत आहे. सगळीच मंडळे हुल्लडबाजी करणारी नव्हती. तेच आदर्श आहे. हे आता काही प्रमाणात ध्यानात येत आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी गणेशोत्सवाचे स्वरूप बदलत आहे  .हे चांगले लक्षण आहे. बहुतेक ठिकाणी गणेशोत्सवाचे पावित्र्य जपले जाते. हुल्लडबाजी फारशी होत नाही. कित्येक कार्यकर्ते म्हणविणारे लोक मंडपात, विसर्जन मिरवणुकीत  दारू पिऊन यायचे. लोकांना आणि लोकमान्यांना हे स्वरूप तर नक्कीच अपेक्षित नव्हते. ते स्पृहणीय ही नाही.

या गणेशोत्सवाच्या निमित्ताने आता धर्मभेद, भेदभाव काही राहिला नाही. सर्व जातिधर्माचे लोक बिनधास्त गणेशोत्सवात सहभागी होतात. ही खूप चांगली सुधारणा आहे. अजूनही काही ठिकाणी गोंधळ घातला जातोच. ते चूक आहे. स्पर्धा सुद्धा निकोप असावी. मुख्य म्हणजे गणेशोत्सवाचे पावित्र्य राखले पाहिजे.          खरोखरच लोकांनी त्यानिमित्ताने एकत्र यावे. विचारांची देवाणघेवाण करावी.

आता नवीन संकल्पनेनुसार एक गाव एक गणपती या कल्पनेचाही  विचार पुढे येतो आहे.  यात पर्यावरणाचा   समतोल राखणेही महत्वाचे ठरते.गणेशोत्सवाचा मूळ उद्देश मर्यादित न राहता लोकमान्यांनी संकल्प केल्याप्रमाणे अधिक व्यापक असावा. त्यातून अखंड निकोप, निर्वैर, सुसंघटित समाजाचे प्रतिबिंब उमटावे. नवीन पिढीने काही चांगले संस्कार जतन करून चांगले संकल्प सोडावेत. त्यांचा राष्ट् उभारणीच्या कामात या गणेशोत्सवाच्या स्वरूपाचा चांगला उपयोग करून घ्यावा. हीच सदिच्छा.

© सुश्री प्रज्ञा मिरासदार

पुणे 

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ माझ्या गाडीला व्हेनीला आईसक्रीम आवडत नाही ☆ संग्राहक – श्री सुनीत मुळे

?इंद्रधनुष्य? 

☆ माझ्या गाडीला व्हेनीला आईसक्रीम आवडत नाही .. ☆ संग्राहक – श्री सुनीत मुळे ☆ 

पियाँटिक ह्या जनरल मोटर्स च्या शाखेला एके दिवशी एक तक्रार आली.

——” माझ्या गाडीला व्हेनीला आईसक्रीम आवडत नाही.”

जनरल मोटर्स ने साहजिकच ह्या तक्रारीकड़े दुर्लक्ष केले. 

काही दिवसांनी पुन्हा त्या व्यक्तीने हीच तक्रार केली. 

यावेळी जनरल मोटर्स ने त्याची चौकशी करायची ठरवले. त्यांनी त्या व्यक्तीला त्याची तक्रार व्यवस्थित सांगणयास सांगितले.

—–व्यक्तीने उत्तर दिले की तो, त्याची पत्नी आणि मुले रोज जेवण केल्यावर आईसक्रीम खायला जातात. रोज वेगवेगळे फ्लेवर घेतात. पण ज्या दिवशी ते व्हेनीला फ्लेवर घेतात त्या दिवशी त्यांची गाड़ी सुरु होत नाही.

जनरल मोटर्सने ‘ असे होउच शकत नाही ‘ असा दावा केला आणि दुर्लक्ष केले. इतर लोकांनी आणि कंपन्यानीसुद्धा त्या व्यक्तीची चेष्टा केली.

——काही दिवसांनी त्या व्यक्तीने परत हीच तक्रार केली. आता मात्र जनरल मोटर्सपुढे त्याची चौकशी करण्याशिवाय पर्याय नव्हता.

त्यांनी आपला एक इंजीनिअर त्या व्यक्ती कड़े पाठवला. इंजीनिअरने गाड़ी चेक केली. सगळे व्यवस्थित  असल्यामुळे नाईलाजाने त्याला त्या व्यक्तीसोबत रहावे लागले. रात्री आईसक्रीम खायला जाताना इंजीनिअर पण सोबत गेला. आईसक्रीम खाऊन सगळे घरी आले. दुसऱ्या दिवशी परत आईसक्रीम खायला गेले. व्यक्तीने व्हेनीला आईसक्रीम आणले —- आणि काय आश्चर्य त्या व्यक्तीने सांगितल्या प्रमाणे गाड़ी सुरुच झाली नाही. 

——-इंजीनिअरने परत गाड़ी चेक केली पण सगळे नीट होते. शेवटी त्याने कंपनीला कळवले की व्यक्तीने सांगितलेली तक्रार खरी आहे.

कंपनीने इंजीनियर ला तिथेच राहून नीट लक्ष देण्यास सांगितले. त्याप्रमाणे इंजीनिअरने प्रत्येक गोष्टीची पाहणी करायला सुरवात केली. रोज त्या व्यक्तीबरोबर आईसक्रीम खायला गेल्यावर काही दिवसानंतर इंजीनिअरच्या लक्षात आले की ती व्यक्ती  जेव्हा बाकीचे फ्लेवर घेते, तेव्हा त्याला गर्दीमुळे वेळ लागतो. पण व्हेनीला फ्लेवरला जास्त मागणी असल्यामुळे त्याच्यासाठी वेगळे काउंटर होते आणि सर्विस पण तत्पर होती.  त्यामुळे तो ते घेऊन लवकर येतो. आणि नेमकी हीच गोष्ट इंजीनिअरला पाहिजे होती. त्याने त्या गोष्टीवर खुप अभ्यास केला. तेव्हा लक्षात आले की ती व्यक्ती  जेव्हा बाकीचे फ्लेवर घेते,  तेव्हा त्याला यायला वेळ लागतो. तोपर्यन्त गाडीचे इंजिन थोड़े गार होते, आणि गाड़ी पुन्हा लगेच चालू होते. पण ती व्यक्ती  जेव्हा व्हेनीला फ्लेवर घेते,  तेव्हा तो लगेच परत येतो. त्यामुळे गाडीच्या इंजिनला गार होण्यासाठी पुरेसा वेळ मिळत नाही. त्यामुळे इंजिन मधील पेट्रोलचे इव्हेपरेशन होते आणि ते ब्लॉक होते व परत चालू होत नाही. 

——आणि मग गाडीच्या इंजिनला गार करण्यासाठी लागणारे संशोधन सुरु झाले. जगातील अग्रमानांकित कंपनी मर्सेडीज़ने कार्ल बेंझ व विलिअम मेयबैकच्या मदतीने 1901 साली आपल्या ‘मर्सेडीज़ 35’ साठी पहिला रेडिएटर बसवला, जो आजही इंजिनचा अविभाज्य भाग आहे.

——–एकादी फालतु वाटणारी गोष्टसुद्धा जगाला किती पुढे घेऊन जाते हेच यातून सिद्ध होते.

म्हणून—दृष्टिकोन बदला….. परिस्थिती बदलेल…… ! ??

 

संग्राहक – श्री सुनीत मुळे

९८२२८४६७६२.

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ घालीन लोटांगण वंदीन चरण…… ☆ प्रस्तुती सुश्री माधवी काळे

? वाचताना वेचलेले ?

☆ घालीन लोटांगण वंदीन चरण…… ☆ प्रस्तुती सुश्री माधवी काळे ☆ 

||वैशिष्ट्ये व अर्थ||

बाप्पाची आरती झाल्यानंतर एका लयीत व धावत्या चालीत ही प्रार्थना म्हटली जाते .अतिशय श्रवणीय व नादमधुर असल्याने खूपच लोकप्रिय आहे. सर्वत्र म्हणले जाते व भक्त त्यात तल्लीन होऊन जातात.

आज आपण या प्रार्थने मधील वैशिष्टे पाहूया व त्याचा अर्थ समजावून घेऊ. ही प्रार्थना चार कडव्याची आहे व पाचवे कडवे हे एक मंत्र आहे.

वैशिष्ट्ये 

(१) प्रार्थनेतील चार कडव्यांचे कवी हे वेगवेगळे आहेत. 

(२) ही चारही कडवी वेगवेगळ्या कालखंडात लिहिली गेली आहेत.

(३)  पहिले कडवे मराठीत असून उरलेली कडवी संस्कृत भाषेत आहेत. (४)बऱ्याच जणांना असे वाटते की ही गणपतीची प्रार्थना आहे. पण ही सर्व देवांच्या आरती नंतर म्हणली जाते. 

(५)सर्व  कडवी कृष्णाला  उद्देशूनआहेत. यातील एकही कडवे गणपतीला उद्देशून नाही.

(६) वेगवेगळ्या कवींची व वेगवेगळ्या कालखंडातील कडवी एकत्र करून ही प्रार्थना बनवली गेली आहे.

आता आपण प्रत्येक कडवे अर्थासह पाहूया

[१]

घालीन लोटांगण वंदीन चरण |

 डोळ्यांनी पाहिन रूप तुझे | 

 प्रेमे आलिंगन आनंदे पूजीन |

भावे ओवाळीन म्हणे नामा |

—वरील कडवे संत नामदेवांनी तेराव्या शतकात लिहिलेली एक सुंदर रचना आहे

  अर्थ..

कृष्णाला उद्देशुन संत नामदेव म्हणतात, तुला मी लोटांगण घालीन व तुझ्या चरणांना वंदन करीन. माझ्या डोळ्यांनी तुझे रूप पाहिन एवढेच नाही तर तुला मी प्रेमाने आलिंगन देऊन  अत्यंत मनोभावे तुला ओवाळीन .

[२]

     त्वमेव माता च पिता त्वमेव |

     त्वमेव बंधुश्च सखा त्वमेव |

    त्वमेव विद्या द्रविणं त्वमेव |

    त्वमेव सर्व मम देव देव |

——हे कडवे आद्यगुरू शंकराचार्यांनी गुरुस्तोत्रात लिहिलेले आहे. ते संस्कृत मध्ये आहे .हे आठव्या शतकात लिहिले गेले आहे.

 अर्थ..

तूच माझी माता व पिता आहेस. तूच माझा बंधू आणि मित्र आहेस. तूच माझे ज्ञान आणि धन आहेस. तूच माझे सर्वस्व आहेस .

[३]

  कायेन वाचा मनसेन्द्रियैर्वा |

  बुद्ध्यात्मना वा प्रकृती स्वभावात |

  करोमि यद्येत सकल परस्मै |

  नारायणापि समर्पयामि ||

——-हे कडवे श्रीमदभगवत पुराणातील आहे. ते व्यासांनी लिहिलेले आहे.

अर्थ…

श्रीकृष्णाला उद्देशून

हे नारायणा ,माझी काया व माझे बोलणे माझे मन, माझी इंद्रिये, माझी बुद्धी माझा स्वभाव आणि माझी प्रकृती यांनी जे काही कर्म मी करीत आहे ते सर्व मी तुला समर्पित करीत आहे.

[४]

 अच्युतम केशवम रामनारायणं |

 कृष्ण दामोदरम वासुदेवं हरी |

 श्रीधर माधवं गोपिकावल्लभं |

 जानकी नायक रामचंद्र भजे ||

——-वरील कडवे आदि शंकराचार्यांच्या अच्युताकष्ठम् मधील आहे. म्हणजेच आठव्या शतकातील आहे.

अर्थ…

मी भजतो त्या अच्युताला, त्या केशवाला, त्या रामनारायणाला, त्या श्रीधराला, त्या माधवाला, त्या गोपिकावल्लभाला, त्या श्रीकृष्णाला आणि मी भजतो त्या जानकी नायक श्रीरामचंद्राला .

हरे राम हरे राम |राम राम हरे हरे|

           हरे कृष्ण हरे कृष्ण |कृष्ण कृष्ण हरे हरे |

——हा सोळा अक्षरी मंत्र “कलीसंतरणं” या उपनिषदातील आहे.( ख्रिस्तपूर्व काळातील असावा.) कलियुगाचा धर्म हे हरिनाम संकीर्तन आहे. याशिवाय कलियुगात कोणताच उपाय नाही. हा मंत्र श्री राधाकृष्णाला समर्पित आहे.

अशी ही वेगवेगळ्या कवींची, वेगवेगळ्या भाषेचे मिश्रण असलेली प्रार्थना अत्यंत श्रवणीय आहे .तिचे नादमाधुर्य व चाल अलौकिक आहे. रचना कोणाची असो हे गाताना भक्त तल्लीन होतात व त्यांचा भाव देवा पर्यंत पोचतो .

 – राम कृष्ण हरी

प्रस्तुती  – सुश्री माधवी काळे

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares