चीनच्या वुहानहून निघालेल्या ‘करोना’ नावाच्या वादळानं आपल्या सर्वांच्या मानसिकतेवर आघात केला. पाठोपाठ अरबी समुद्रात सक्रिय झालेल्या ‘तौक्ते’ नावाच्या वादळानं आपली नैसर्गिक संपत्ती जमीनदोस्त केली. आपल्या मातृभूमीचं प्रवेशद्वार घायाळ झालं तसं आपलं मन ही…..
या वादळाचं रौद्र रूप पाहताना, अनुभवताना,आपल्या मनाची किनार उध्वस्त झाली.सागराच्या छातीवर दिमाखानं झुलणारी गलबतं, त्याच्याच पोटात बुडून गेली. कित्येक दर्याचे राजे काळाच्या पडद्याआड गेले.राण्यांना वैधव्य आले.अश्रू परवानगीशिवाय डोळ्यातून सांडू लागले.
समस्त दर्यावर्दीना नेमेची भेटीला येणारं वादळ परिचयाचं असं.. सागराच्या भरती-ओहोटीचा खेळ सुख-दुःखाच्या लाटांगत अंगावर झेलत जीवन जगणारी ही माणसं. जीवनाच्या बोटीवर आनंदाचं शीड फडकवणारी ही जमात… हा विचार मनांत येताच ‘वादळ वारं सुटलं गं, वार्यानं तुफान उठलं गं.. या ओळींचं स्मरण झालं. शब्दप्रभू शांता शेळके यांनी लिहिलेल्या या गीतानं वादळाकडं सकारात्मक हेतूनं पाहण्याचा दृष्टिकोन मला मिळाला.
‘प्रतिभा’ हा शब्द थिटा पडावा अशी दैवी देणगी लाभलेल्या शांताबाई म्हणजे अनेकविध काव्य प्रकारांची एकाच काव्यशेल्यात गुंफण करणाऱ्या मनस्वी कवयित्री! त्यांची तीन कोळीगीतं म्हणजे बिल्वदलंच जणू! प्रत्येक गीत आनंदाच्या लाटा अंगावर घेत मस्तीत झुलावं अशा अवीट गोडीची….
कथाप्रवण आणि भावप्रवाही असणारी अशी ही तीनही गीतं…..
***वादळ वारं सुटलं गं……
प्रत्येक वेळी समुद्रात जाळं टाकताना जीवाची पर्वा न करणारा निधड्या छातीचा हा ‘दर्याचा राजा’आणि तितकीच निडर अशी ‘कोळीवाऱ्याची राणी’.समुद्राच्या रोजच्या वर्तनाबद्दल अनभिज्ञ असणारी ती, नेहमीच लाटांना आव्हान देत आनंदात गाते.तिचा तिच्या नाखवा यावर प्रचंड विश्वास आहे म्हणूनच हे शक्य आहे. वारं,वादळ, तुफान,दर्याला येणारी भरती,पावसाचा कहर या सगळ्यांचं आव्हान ती स्वीकारते, नारळी पौर्णिमेला दर्याची पूजा करून आपल्या नाखव्यासाठी साकडं घालते, आणि आत्मविश्वासानं जगते.
एरवी नाखव्याला भेटीचा निरोप ज्या ढगांकरवी ती देत असते तेच ढग आज बेईमान झाले आहेत. वादळ, वार आणि तुफान या त्रिकुटाची तीव्रता ढगांच्या गडगडल्याने जास्त गंभीर होते आणि नकळत राणीच्या हृदयाची धडधड वाढते. शांताबाईंनी ह्या तिच्या धडधडीला ‘जणू शिडाची फडफड’ असं म्हटलं आहे.
नाखवा कामावर गेल्यावर रोजंच ती एकटी असते.पण तो एकांत असतो. आजचं आहे ते जीवघेणं एकटेपण… त्यामुळे माडांची सळसळ आणि खोपीतलं एकटेपण यामुळं तिचा डोळा लागत नाहीये.स्वप्नभंग होतोय की काय?अशी शंकेची पाल तिच्या मनांत चुकचुकतेय. तिची मानसिकता रंगवणाऱ्या शांताबाईंनी आपल्या काव्य प्रतिभेने येथे सर्वांना मंत्रमुग्ध केलय.
तुफान वारा सुटल्यावर आपल्या डोलकराला साद घालणारी आर्त, अगदी मनाला भिडणारी… हा हा हा रे……म्हणत गानकोकिळेतनं ती अचूक साधली आहे. प्रीतीचा जल्लोष असलेलं हे गीत, केवळ अप्रतिम!!
पाण्याला जसं उधाण येत चाललं तसं गाण्यातला वादळाचा वेगही वाढू लागला.ऋजू स्वभावाच्या शांताबाईंनी राणीच्या तोंडी एक सकारात्मक चारोळी देऊन वातावरण आनंदमयी करून टाकलंय. ‘सरसर चालली होडीची ताल’ म्हणत दर्याची राणी तिच्याच तालात नाचू लागते. नाखवा, त्याची बोट, फेसाळणारं पाणी यांना पाहून ती खूश होते. चांदणस्पर्शानं चमचमत्या झालेल्या मासोळ्या अर्थातच ‘दर्याचं धन’ गोळा करणाऱ्या तिच्या नाखव्याला ती ‘दर्याचा राजा’ म्हणते आणि स्वतःला दर्याची राणी म्हणवण्यात धन्यता मानते. मासळीबाजारात हा ताजा म्हवरा विकायला घेऊन जाताना ती सुखावते……
** राजा सारंगा माझ्या सारंगा….
वरील गाण्याच्या बरोबर उलट्या अर्थाचं हे गीत…. वाऱ्यानं पाण्यात अलगद लाटा उसळाव्यात तसं हळुवार असं! या गीतातील दर्याची राणी वातावरणाची थोडी अनामिक भीती घेऊन जगते आहे. ‘सारंगा’ म्हणजे तिच्या नाखव्याची बोट…. तिला ती स्वतःचा धाकला दीर संबोधते त्याला ती ‘माझ्या डोलकराला अलगद घेऊन चल घरी’ अशी विनंती करते.वातावरणाचा अंदाज नाखवालाही आहे, तरीदेखील ती पुन्हा पुन्हा त्याची जाणीव करून देते. शेवटी अगतिक होऊन तिचे डोळे पाण्याने डबडबतात. शांताबाईंनी तिच्या डोळ्यातील अश्रुंना ‘पाण्याचा पूर’म्हणून विषयाचं गांभीर्य आणखी गडद केलंय…. संबाल संसार सारा… या ओळीतून तिची कळकळ जाणवते.
** डोलकर डोलकर दर्याचा राजा..
पराकोटीची वेगळी जातकुळी असलेला वेलवेट व्हॉइस (मखमली आवाज) असणाऱे हेमंत कुमार आणि लतादीदी यांचं हे द्वंद्वगीत….. बिल्वदलातलं हे तिसरं पान….कोळी भाषेतील शब्दांची साखरपेरणी करत शांताबाईंनी लिहिलेलं हे गीत, कोळीवाड्याचा माहोल डोळ्यासमोर उभं करतं. आपसूकच मन कोळी नृत्य करू लागतं……
लता मंगेशकर यांचं कौतुक ते काय करावं आम्ही पामरांनी? ‘या गो दरियाचा दरियाचा दरारा मोठा……..हे ऐकताना मोठा हा शब्द अवाढव्य होतो. ‘उठतया डोंगर लाटा लाटा लाटा…………..हे ऐकताना डोंगराएवढ्या लाटांची भीती वाटण्याऐवजी त्यावर बसून झुलाव असं वाटतं.
पंडित हृदयनाथ यांचं वादळी पण सुमधुर संगीत, प्रतिथयश गायकांचा आवाज आणि शांताताई यांची शब्दरचना असलेली ही कोळी गीतं ऐकताना मन कोळीवाड्यात भन्नाट फिरून येते…. पदन्यास घालतं….उधाण वारा पिऊन मन तृप्त होतं…
आमच्या लहानपणी गणेशोत्सव असला की गणराज रंगी नाचतो, नाचतो पायि घागर्या करिती रुणझुण नाद स्वर्गि पोचतो ! व
गजानना श्री गणराया, आधी वंदू तुज मोरया !
मंगलमूर्ती श्री गणराया, आधी वंदू तुज मोरया !
ही गीते लाउडस्पीकरवर सतत वाजायची. पुढे मोठे झाल्यावर ही गाणी शांताबाईने लिहिली हे कळले. त्यांच्याबद्दल आदर वाटू लागला. शांताबाई एक प्रतिभासंपन्न मराठी कवयित्री होत्या. याशिवाय त्या एक प्राध्यापिका, संगीतकार, लेखिका, अनुवादक, बाल साहित्य लेखिका, साहित्यिक, आणि पत्रकार होत्या. त्यांचे पूर्ण नाव शांता जनार्दन शेळके आहे. त्यांचा जन्म इंदापूर यथे झाला. त्यांनी आपले बालपण मंचर येथील खेड येथे घालवले. त्यांच्या वडिलांना त्या दादा आणि आईला (अंबिका वहिनी) वहिनी म्हणत असत.एकूण ही पाच भावंडे त्यात शांतबाई सगळ्यात मोठ्या.आईच्या मृदू स्वभावाचे, तिच्या चित्रकलेचे, तिच्या वाचनवेडाचे संस्कार कळत-नकळत शांताबाईंवर होत राहिले. शांताबाईचे वडील रेंजर फॉरेस्ट ऑफिसर होते. वडिलांच्या बदलीमुळे चिखलदरा, नांदगाव, खर्डी येथे राहावे लागले. चित्रकलेचे संस्कार आणि वाचनाची आवड शांताबाईवर कायमच राहिली.. त्या लहान होत्या, तेव्हा त्यांच्या कानांवर विविध पारंपारिक गाणी, कविता आणि श्लोक पडले. म्हणूनच त्यांचे काव्यप्रेम, वाचनावरचे प्रेम या ग्रहणशील युगात रुजले. १९३० मध्ये शांताबाईच्या वडिलांचे निधन झाले तेव्हा त्या नऊ वर्षाच्या होत्या.चौथीपर्यंत त्यांचे शिक्षण झाले. 1938 मध्ये त्या मॅट्रिक झाल्या. आणि पुणे येथून पदवीधर झाल्या. महाविद्यालयातून बी. ए पूर्ण झाले. प्रा. श्री. म. माटे, प्रा. के. ना. वाटवे, प्रा. रा. श्री. जोग यांच्यामुळे अभ्यासाच्या पुस्तकाव्यतिरिक्त अवांतर वाचनाची, कवितेची गोडीही वाढत राहिली.या काळात साहित्याचे सखोल संस्कार त्यांच्यावर झाले.कॉलेजच्या नियतकालिकासाठी त्यांनी एक लेख लिहिला.प्रा. माटे यांच्या त्यावरील अभिप्रायाने त्यांना लेखनासाठी हुरूप आला.हळूहळू त्या कविता, लेख, लिहू लागल्या. बी.ए. झाल्याबरोबर मुक्ताआणिइतरगोष्टी नावाचा त्यांचा एक कथासंग्रहही निघाला. याला प्रा. माटेसरांनी प्रस्तावना लिहिली.१९४४ मध्ये संस्कृत घेऊन शांताबाई एम्.ए. झाल्या. या परीक्षेत त्यांना तात्यासाहेब केळकर सुवर्णपदक मिळाले. एम्.ए. झाल्यावर सुरुवातीला त्यांनी आचार्य अत्रे यांच्या समीक्षक मासिकात, नंतर नवयुग या अत्र्यांच्या साप्ताहिकात आणि दैनिकमराठात दोनतीन वर्षे काम केले. विविध प्रकारच्या लेखनाच्या अनुभवाची शिदोरी त्यांना येथे मिळाली. अनेक साहित्याविषयक गोष्टी त्यांना इथे शिकायला मिळाल्या. नागपूरचे हिस्लॉप कॉलेज, मुंबईचे रूईया आणि महर्षी दयानंद महाविद्यालयात त्यांनी अनेक वर्षे अध्यापन केले.
आळंदी येथे १९९६ साली भरलेल्या अखिल भारतीय मराठी संमेलनाच्या त्या अध्यक्षा होत्या.
अनुवादक, समीक्षा-स्तंभ लेखिका, वृत्तपत्र सहसंपादिका म्हणूनही शांता शेळके यांनी साहित्यात मोलाची भर घातली आहे शांता शेळके या केंद्रीय फिल्म प्रमाण मंडळाच्या, तसेच राज्य नाटक परिनिरीक्षण मंडळाच्या सदस्य होत्या. शांताबाईंनी डॉ. वसंत अवसरे या टोपण नावाने देखील गीते लिहिली. ६ जून २००२ रोजी ७९ व्या वर्षी शांता शेळके यांचे निधन झाले.
शांता शेळके यांना मिळालेले पुरस्कार :- गदिमा गीतलेखन पुरस्कार १९९६, सुरसिंगार पुरस्कार (’मागे उभा मंगेश, पुढे उभा मंगेश’ या गीतासाठी), केंद्र सरकारचा उत्कृष्ट चित्रगीत पुरस्कार (चित्रपट भुजंग), यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान पुरस्कार (२००१) साहित्यातील योगदानाबद्दल
साहित्यसंपदा :- कविता, गीत, चित्रपटगीत, कथा, कादंबरी, बालसाहित्य अशा विविध साहित्यप्रकारात शांताबाईंची जवळपास शंभर पुस्तके प्रकाशित झाली आहेत. वर्षा (१९४७) हा त्यांचा पहिला काव्यसंग्रह. रूपसी (१९५६) तोच चंद्रमा (१९७३) गोंदण (१९७५), अनोळख (१९८६), कळ्यांचेदिवस, फुलांच्याराती (१९८६), जन्मजान्हवी (१९९०),चित्रगीते (१९९५),पूर्वसंध्या (१९९६), इत्यर्थ (१९९८) एक गाणे चुलीचे – स्नेहवर्धन प्रकाशन, कविता विसावया शतकाची – उत्कर्ष प्रकाशन, कविता स्मरणातल्या- मेहता प्रकाशन, गोंदण – मेहता प्रकाशन, जन्मजान्हवी, तोच चंद्रमा- सुरेश एजन्सी, निवडक शांता शेळके- उत्कर्ष प्रकाशन, हे त्यांचे इतर काव्यसंग्रह प्रसिद्ध झाले आहेत.
शांताबाईंची भक्तिगीते :-
गणराज रंगी नाचतो, नाचतो
पायि घागर्या करिती रुणझुण नाद स्वर्गि पोचतो !
कटि पीतांबर कसून भर्जरी बाल गजानन नर्तनास करी
तुंदिल तनु तरि चपल साजिरी लावण्ये साजतो !
नारद तुंबरु करिती गायन करी शारदा वीणावादन
ब्रह्मा धरितो तालही रंगुन मृदंग धिमि वाजतो !
देवसभा घनदाट बैसली नृत्यगायने मने हर्षली
गौरीसंगे स्वये सदाशिव शिशुकौतुक पाहतो !
नादयुक्त शब्दरचना कशी असावी याचे हे गीत आदर्श उदाहरण ठरावे. यातल्या प्रत्येक शब्दाला एक अनोखा झंकार आहे, यातली गेयता कर्णमधुर ठरावी अशी आहे कारण याची टिपेला जाणारी स्वररचना होय. त्याचबरोबर बालगणेशाचा ह्रदयंगम कौतुक सोहळा चपखल शब्दात अवीट गोडीच्या चालीत इथे रचला आहे. या गीतावर आपल्या नकळत आपली मान डोलावते.
गजानना श्री गणराया, आधी वंदू तुज मोरया !
मंगलमूर्ती श्री गणराया, आधी वंदू तुज मोरया !
सिंदुरचर्चित ढवळे अंग, चंदनऊटी खुलवी रंग
बघता मानस होते दंग, जीव जडला चरणी तुझिया
गौरीतनया भालचंद्रा, देवा कृपेच्या तू समुद्रा
वरदविनायक करुणागारा, अवघी विघ्ने नेसी विलया
गणेशोत्सवात हे गाणं ऐकलं नाही असं सांगणारा माणूस अख्ख्या महाराष्ट्रात सापडणार नाही. शांताबाईंनी लिहिलेल्या या भक्तीगीताने मराठी माणसाचे खुद्द गणेशासोबतचे नाते दृढ केले आहे असं म्हटलं तर अतिशयोक्ती ठरणार नाही. इतकं हे गाणं गणेशोत्सवाशी एकरूप झाले आहे.
मागे उभा मंगेश, पुढे उभा मंगेश माझ्याकडे देव माझा पाहतो आहे. लता मंगेशकरांनी छान गाईले आहे. राम भजन कर लेना, जय शारदे वागीश्वरी, शोधितो राधेला श्रीहरी, नको रे नंदलाला ही भक्तिगीते आपण वारंवार ऐकली आहेत।
शांताबाईंची कोळीगीते :-शांताबाईंची कोळीगीते कथाप्रवण आहेत, त्यातल्या कथा उत्कंठा वाढविणाऱ्या आहेत त्यामुळे त्याला वेगळीच अनुभूती प्राप्त होते. कोळीगीतातली लयबद्ध गोडी हे या गीताचं विशिष्ट्य ठरावं. या गीतात देखील कथात्मकतेची विण आहे, तिचा बाज प्रश्नोत्तर स्वरूपाचा आहे. लडिवाळीकतेच्या अंगाने जाणारे हे एक युगलगीत आहे, ज्यात ते दोघेही एकमेकासाठी आसक्त झालेयत अन निसर्गाला साक्षीस ठेवून ते साद घालताहेत.
वल्हव रे नाखवा हो वल्हव रे रामा
मी डोलकर डोलकर, डोलकर दर्याचा राजा
घर पान्यावरी बंदराला करतो ये जा !
आयबापाची लाराची लेक मी लारी
चोली पीवली गो नेसलंय अंजीरी सारी
माज्या केसान गो मालीला फुलैला चाफा
वास परमालता वार्यानं घेतंय झेपा
नथ नाकान साजीरवानी
गला भरुन सोन्याचे मनी
कोलिवाल्याची मी गो रानी
रात पुनवेला नाचून करतंय् मौजा
वादलवारं सुटलं गो वार्यान तूफान उठलग
तुफानवारं सुटल्यानंतर आपल्या डोलकराला साद घालणाऱ्या कोळीणीची आर्तता मनाला भिडणारी आहे, डोळ्यात पाणी आणून ती म्हणते की, ‘डोलां लोटीला पान्याचा पूर संबाल संसार सारा..’ या गाण्याला सुरसंगीताचा अप्रतिम साज चढवल्याने ते अत्यंत श्रवणीय झालेय.
माज्या सारंगा, राजा सारंगा, डोलकरा रं धाकल्या दीरा रं
चल जावया घरा !
आज पुनवा सुटलंय दमानं दरियाच्या पान्याला आयलंय उदान
पिऊन तुफानवारा शीड फाटलं धावतं पाठी
तुटलंय् सुकानू मोरली काठी
फेसाल पान्याचा घेरा कोलीवारा रं राहीला दूर
डोलां लोटीला पान्याचा पूर संबाल संसार सारा
माजे रानी माजे मोगा, माजो लवताय डावा डोळा ही गीते कायम स्मरणात राहतात.
शांताबाईने लिहिलेली प्रेमाची गाणी:- शालू हिरवा पाच नि मढवा वेणीत पेढी घाला साजणी बाई येणार साजण माझा, जिवलगा राहिले रे दूर घर माझे, शोधू मी कुठे कशी, सांगू कशी प्रिया मी, पायावरी प्रियाच्या सर्वस्व, मनाच्या धुंदीत लहरीत ये ना सखे ग साजणी ये ना, प्रीति जडली तुझ्यावरी, घन रानी साजणा, प्रीतफुले माझी सोनेरी, प्राणविसावा लहरि सजण, चित्र तुझे हे सजीव होऊन, अशीच अवचित भेटून जा, असता समीप दोघे हे, तळमळतो मी इथे तुझ्याविण ही गाणी खूप लोकप्रिय झाली.
शांताबाईने लिहिलेली निसर्गाची गाणी:- पाऊस आला वारा आला, श्रावणसरी, ऋतु हिरवा, ऋतु बरवा तर ‘ऋतू हिरवा’ या कवितेत ऋतूंचे इंद्रधनुष्यी रंगातले चित्र त्या आपल्या शब्दकुंचल्यातून साकारतात. भिजुनी उन्हे चमचमती, मधुगंधी तरल हवा, मनभावन हा श्रावण, पुढे त्या म्हणतात भिजवी तन, भिजवी मन हा श्रावण
थरथरत्या अधरांवर प्रणयी संकेत नवा
नभी उमटे इंद्रधनू, मदनाचे चाप जणू
गगनाशी धरणीचा जुळवितसे सहज दुवा…’ अशी मनमोहक शब्दसंगती त्यांनी योजली आहे.
चंद्र चांदण्याचे गाणे :- चांदणं टिपूर हलतो वारा, चांदण्या रात्रीतले ते, शारद सुंदर चंदेरी राती स्वप्नाचा झुलव झूला, पुनवेचा चंद्रम आला, चंद्र दोन उगवले, आज चांदणे उन्हात हसले, तोच चंद्रमा नभात ही गाणी अनेकांच्या ओठावर आपसूकच येतात.
बालगीते:- विहीणबाई विहिणबाई उठा आता उठा
भातुकलीचा सार्या तुम्ही केला चट्टामट्टा !
पसाभर शेंगदाणे, पसाभर गूळ
एकटीनं फस्त केलं लागलं का खूळ?
खादाडखाऊ विहीण म्हणून सारी करती थट्टा !
कुठुन मेलं बाहुलीचं लग्न काढलं आम्ही?
विहीण म्हणून नशिबी आलात हो तुम्ही !
बाळी आमची नाजुक तुमचा बाळ्या केवढा मोठा !
सोन्यासारखी लेक दिली आणि फसलो
भिकार्यांशी नातं जोडुन बसलो !
वरमाईचा पोकळ नुसता पाहून घ्यावा ताठा !
बडबडगीताच्या चालीवर आधारित भातुकलीच्या विवाहप्रसंगातलं लोकगीतही शांताबाईंनी मोठ्या तन्मयतेने लिहिले आहे. त्याला तितकीच रसिकमान्यताही मिळाली ! या गाण्याला गाताना आजही बालपणातला आनंद अनुभवता येतो.
बाळ गुणी तू कर अंगाई, बाळा माझ्या नीज ना, टप टप टप टाकित टापा चाले माझा घोडा, जो जो गाई कर अंगाई, झुलतो झुला जाई आभाळा, किलबिल किलबिल पक्षि ही सारी बालगीत आजही मनाला आनंद देतात.
देशप्रेमाच्या कविता :- ‘शूर आम्ही सरदार अम्हाला काय कुणाची भीती?
शांता शेळके यांनी लिहिलेले हे गीत शाळकरी मुलापासून ते उतारवयाकडे झुकलेल्या ज्येष्ठापर्यंत सकलांच्या अंगावर रोमांच उठवते. नसानसात जोश भरणारी ही कविता इतकी आवेशपूर्ण आहे की ऐकणाऱ्याच्या मनामध्ये स्फुरण निर्माण होते. ‘मराठा तितुका मेळवावा’ या चित्रपटात लता मंगेशकरांच्या संगीत दिग्दर्शनाखाली हृदयनाथ मंगेशकर यांनी अप्रतिम स्वरात हे गाणं गायले आहे.
लावणी:- शृंगाररसाचा अतिरेक न करता देखण्या ढंगाची लावणी कशी लिहावी याचं उत्तम उदाहरण म्हणून शांताबाईंच्या लावणीकडे निर्देश करता येईल. आपल्या साडीचं मनमोहक वर्णन करतानाच आपल्या प्रितमास साडीला हात लावू नको असं लाडे लाडेचं सांगणं अगदी मधाळ शैलीत त्यांनी मांडलंय. यातला ठेका ताल धरायला लावणारा आहे. काव्यरचनेत लावणीचा ठसकेबाजपणा आहे, अगदी कोरीव रेखीव असं हे गाणं आजही रसिकप्रिय आहे.
रेशमाच्या रेघांनी, लाल काळ्या धाग्यांनी कर्नाटकी कशिदा मी काढीला
हात नगा लावू माझ्या साडीला !
नवी कोरी साडी लाखमोलाची भरली मी नक्षी फूलयेलाची
गुंफियलं राघूमोर, राघूमोर जोडीला हात नगा लावू माझ्या साडीला !
जात होते वाटंनं मी तोर्यात अवचित आला माझ्या होर्यात
तुम्ही माझ्या पदराचा शेव का हो ओढीला? हात नगा लावू माझ्या साडीला !
भीड काही ठेवा आल्यागेल्याची मुरवत राखा दहा डोळ्यांची
काय म्हणू बाई बाई, तुमच्या या खोडीला हात नगा लावू माझ्या साडीला !
इतक्या विविध विषयावरची आशयघन सहजसोपी व तितकीच रसिकप्रिय काव्यरचना मराठी कवितेत अन्य कुणा कवयित्रीच्या हातून प्रसवली गेली नाही. यात शांताबाईंच्या कवितेची वेगळी उंची दिसून येते.
आपल्या अभिजात प्रतिभेच्या जोरावर मराठी साहित्यात स्वतःचं उत्तुंग स्थान निर्माण करणाऱ्या शांता शेळके प्रत्येक रसिकाला वेगवेगळ्या वयाच्या टप्प्यावर वेगळ्या अवस्थेत भेटत गेल्यात ; बाल्यावस्थेत बडबडगीते, तारुण्यात प्रेमगीते, पोक्तवयात भावगीते आणि उतार वयात भक्तिगीते – भावकविता असा त्यांचा प्रत्येकाशी संवाद होत गेलाय.
☆जागतिक पर्यावरण दिन निमित्त – पर्यावरण दिन… ☆ सुश्री मंजुषा सुनीत मुळे ☆
आज ५ जून – जागतिक पर्यावरण दिन. जसे फादर्स डे, मदर्स डे तसाच … वर्षातून एकदा तरी आईवडील हे शब्द त्यानिमित्ताने नक्की आठवतात, ही आई-वडिलांसाठी समाधानकारक गोष्ट. पण ‘पर्यावरण दिन’? – म्हणजे पर्यावरणाची आठवणही अशीच फक्त एक दिवस काढायची?
“पर्यावरण”… केवढा व्यापक शब्द… हा सकल सजीवसृष्टीचा आधार. क्षणाक्षणाला घेतल्या जाणा-या श्वासाची प्रत ठरवणा-या या पर्यावरणाबद्दलची कृतज्ञता, वर्षातून फक्त एकदाच? तीही फक्त शाब्दिक ? एरवी त्याचे सर्रास हाल करायचे— किती कृतघ्नपणा आहे. निसर्गातल्या सर्व सजीव घटकांमधला, माणूस हा एकच प्राणी असा आहे, जो त्याच्या जीवनदात्याशी अतिशय बेपर्वाईने, निष्ठुरपणे वागतो. इतर सगळे घटक स्वत:च्या मर्यादा ओळखून जगतात आणि म्हणूनच कदाचित् माणसापेक्षा जास्त आनंदात जगतात. इथे एक कविता आठवते……
मुक्त विहरती कशी पाखरे
किलबिल किलबिल आकाश भरे
ऐकियला का कधी कुणी हो
कलरव त्यांचा उसासे भरे ….
वृक्ष-वेली अन् बागा फुलत्या
वा-यासंगे नितचि डोलत्या
पाहियल्या का कधी कुणी हो
वैतागती अन् हिरमुसती त्या…
… ही मुक्तपणे जगणारी पाखरं, मिळेल त्या अन्नपाण्यावर होता होईतो फुलून रहाणारी झाडं-वेली, कधीतरी ‘आणखी’ साठी हपापलेत, देणा-यालाच ओरबडताहेत, वेळप्रसंगी त्याला संपवायचा घाट घालताहेत, असं पुसटसं तरी जाणवतं का? अशक्यच. पण माणूस? तो या सगळ्यांपेक्षा अगदीच वेगळा. जन्माला येतानांच श्वासाबरोबरच हव्यासही घेऊन आलेला… ‘आणखी’ मध्ये जाणवणारा असंतुष्टपणा, हाव, हा तर त्याचा स्थायीभावच …
‘इवलीशी जरी चोच, तिने सतत काही टिपतांना, पोटापुरतंच घ्यावं…
हा पोच बघ आहे का?’
…… हा प्रश्न पक्ष्यांना, आणि मतितार्थाने प्राण्यांनाही विचारण्याची कधी गरज पडत नाही. पण माणूस?… स्वत:च्या पोटाची गरज तर लक्षात घेतच नाही, उलट त्याला एकट्यालाच वरदान म्हणून मिळालेल्या प्रतिभेचा वापर प्रगतीसाठी करण्याच्या नादात, ज्या पर्यावरणामुळे त्याचे जीवन सुरक्षित, सुखी रहाते, त्याचीच अनिर्बंध नासधूस करतो आहे…
खळखळ झरझर पाणी वाहे
समुद्री आणि नदी प्रवाहे,
पाहियले का कधी कुणी हो
वैतागून ते थांबून राहे …
असं अगदी निर्मळपणे पाण्याचं कौतुक करणा-या कवीचाही पूर्ण भ्रमनिरास व्हावा, असं वागत, आज माणूस काय करतो आहे? या नितळ पाण्यात असंख्य प्रकारचा कचरा, घाण, रासायनिक द्रव्यं, मृतदेहाच्या अस्थी, आणि प्रसंगी पूर्ण मृतदेहही टाकण्यात तो जराही कचरत नाहीये. पाणी म्हणजे जीवन म्हणत, तो स्वत:च ते जीवन निरूपयोगी करायला मागे-पुढे पहात नाहीये, हे फक्त पर्यावरणाचंच नाही, तर त्याचं स्वत:चंच दुर्दैव आहे, हे त्याच्या लक्षात येतच नाहीये, की लक्षात घ्यायचंच नाहीये? त्याची गुर्मी, माज, लोभ-मोह, सगळं इतकं वाढलंय, की स्वत:चं वागणं फक्त स्वत:वरच नाही, तर सगळ्या जगावर उलटू शकतं, हे कळत असूनही वळेनासे झालंय् त्याला … हा दैवदुर्विलासच म्हणायला हवा. या विचाराशी थबकल्यावर कवितेतल्या पुढच्या ओळी आठवताहेत…
वाटे मजला रोजच यांना
पहाटेच तो देव भेटतो
षड्रिपु त्यांचे बांधून ठेवून
मुक्त तयांना करून जातो ॥
आम्ही माणसे पाखंडी किती
सुखनिधान ते उरी गाडतो
षड्रिपु सारे मुक्त सोडुनी
सुख शोधत अन् वणवण फिरतो ॥ ….
—खरंच्, पशु-पक्षी, झाडं-वेली अशा निसर्गातल्या इतर गोष्टी लोभ-मोह-मत्सर –सगळ्यापासून दूर असतात, मुक्तपणे जगतात. माणसं मात्र या रिपूंच्या विळख्यात बहुतेक वेळा स्वत:च स्वत:ला अडकवून घेतात, आणि त्या निसर्गाच्या, पर्यायाने पर्यावरणाच्या बाबतीत ‘पाखंडी’पणे वागतात. जगतांना त्याच्या अस्तित्वावाचून पर्याय नाही या सत्याकडेही, स्वत:च्या स्वार्थासाठी सोयीस्कर दुर्लक्ष करतात. पर्यावरणाचा वाढता -हास बघता, ‘प्रगती’ हे नाव गोंडस असले, आणि प्रगती होणे गरजेचेही असले, तरी त्यात दडलेला स्वार्थ, त्या ‘प्रगती’लाच बदनाम करतो, हा विचार माणसाच्या मनात डोकावतही नसेल का? हा प्रश्न वारंवार पडावा, अशीच सध्या सगळीकडची परिस्थिती दिसते. म्हणजे माणसाची मानसिकताच आता अशी झाली आहे का … की …
‘निसर्ग जणू खेळणेच आम्हा, ओलिस त्याला आम्ही ठेवू ।
फुकट सापडे हाती तर त्या, बिगा-यास मुळी मोल न देवू ॥’
हे आता गृहीतच आहे का ? सिमेंटच्या जंगलांसाठी, आणि अल्पजीवी वस्तूंच्या निर्मितीसाठी प्रचंड वृक्षतोड, कधीही विघटन होऊ शकणार नाही अशा कच-याची अतोनात निर्मिती, स्वत:च्या गरजेनुसार, पाण्याच्या नैसर्गिक स्त्रोतांची, प्रवाहांची दिशा आणि गतीही बदलणे, सोय म्हणून नदीत कचरा टाकत पाणी प्रचंड प्रदूषित करणे, उत्पादन प्रक्रियेत निर्माण होणारे प्रचंड विषारी वायू, त्यांचे घातक परिणाम माहिती असूनही वातावरणात मुक्तपणे सोडणे… अशासारख्या, पर्यावरणाची पूर्णपणे वाट लावणा-या गोष्टी जगभर दिवसेंदिवस सर्रासपणे वाढत असतांना, वर्षातला एक दिवस ‘पर्यावरण दिन’ म्हणून साजरा करणे म्हणजे, पर्यावरणाचा घोर अपमान करणेच आहे. स्वत:च्या आईला निलाजरेपणाने कसेही वागवायचे आणि फक्त ‘मदर्स डे’ला, ‘मदर’ हा फार व्यापक अर्थाचा शब्द केवळ उच्चारायचा, तसंच वाटतं, आज ‘पर्यावरण दिन’ आहे म्हणतांना … हे अहितकारक चित्र बदलायलाच पाहिजे… स्वतःला बुद्धिमान ‘माणूस’ म्हणवणा-यांनीच बदलायला पाहिजे.
☆ पुणेरी मिसळ – गुंड्याभाऊंचा कोरोना! ☆ श्री अभय जोशी ☆
प्रिय गुंड्याभाऊ,
स. न. वि.वि.
तुला कोविडबाधा झाल्याचे समजले. मीही दोन दिवस तापलो होतो. पण ते लसीकरणामुळे. तुला सांगणारच होतो. तेवढ्यात तुझ्या बाधेचे वृत्त समजले. घालमेल सुरू झाली. अखेर परवा चि. मोरूने व्हिडीओकॉल लावून दिला. पण तुला खोकल्याची उबळ येत होती. बोलणे शक्य नव्हते. अखेर आज हे पत्र तुला पाठवतोय. त्या दिवशी मोबाईलवर चेहराच दिसला तुझा फक्त. खाली किती वाळला आहेस, याचा अंदाज आला नाही. असो. स्कोअर फारच कमी आहे तुझा, ही आनंदाची बाब. (शाळा-कॉलेजात कधी तुझा स्कोअर वाढला नव्हता, ही चिंतेची बाब होती) बहुतेक कोरोनाला तुझी बाधा झाली असावी, असो. तू नक्की खडखडीत बरा होणारेस. ज्या वयात ‘मदनबाधा’ व्हायला हवी होती, तेव्हा काही झालं नाही. आता भलत्या वयात ‘कोविडबाधा’ मात्र होतेय. (हास जरा मेल्या. खोकू नकोस). डॉक्टर सांगतील ती सारी औषधे घे. पथ्ये पाळ. ‘मी दणकट आहे, काही होणार नाही,’ या भ्रमांत राहू नकोस. या कोरोनाने भल्या भल्यांना ग्रासलेंय. कोविडबाधेत माझा आधी नंबर लागेल, असं वाटलं होतं. पण तू लावलास. असो. लवकर बरा हो. अशक्तपणा घालवण्यासाठी अति पौष्टिक आहाराचा फार मारा करू नकोस. सुक्यामेव्याचा तोबरा भरणे, वरणभाताच्या ढिगाऱ्याचा फडशा पाडणे, भाकऱ्यांची चळत संपवणे… असले अघोरी प्रकार करू नकोस. मिताहार कर, पण पौष्टिक कर. नाही तर अति आहारानेंही कोविड स्कोअर वाढतो म्हणे. शिवाय गृह विलगीकरणात आहेस. चौदा दिवसांनी त्या खोलीच्या बाहेर यायचेंय. नाही तर लठ्ठपणा वाढल्याने दारातच अडकशील. (हसू नकोस, खोकला येतोय तुला.) ऑक्सिमीटरचा चिमटा जवळ ठेव. नियमित तपास. फक्त त्या चिमट्यात बोटं घालण्याचा नाद लावून घेऊ नकोस. बॅटरी संपेल. मग ते मीटर काहीच दाखवणार नाही. तुला वाटेल ऑक्सिजन संपला की काय? घबराट उडेल. त्यानेंही ऑक्सिजन खालावतो. अशा वेळी पालथा झोप. (ढेरीमुळे ते किती शक्य होईल, शंकाच वाटते. सीसॉ होईल शरीराचा) तरीही झोप तसाच. त्याने ऑक्सिजन वाढतो म्हणतात. असो. बरा झाल्यावर उंडारू नकोस लगेच. भलता अशक्तपणा असतो. आमच्या शेजारचे चिंतोपंत असेच चौदाव्या दिवशी उंडारायला लगेच बाहेर पडले. तर रस्त्यात पँटच घसरली. ते सावरताना त्यांनाही चक्कर आली. आधी चक्कर आली की पँट घसरली, नेमकें आधी काय घडले, ते समजले नाही. पण जे काही झालें ते अशक्तपणामुळेच. असो. तू मात्र हे लक्षात ठेव. पुढच्यास ठेच मागचा शहाणा. पुढच्या वेळी घरी प्रत्यक्ष भेटू.
– तुझा चिमण.
≡≡≡≡≡≡≡≡≡
प्रिय चिमण,
स. न. वि.वि.
तुझं पत्र मिळालं. बरं वाटलं. या कोरोना विलगीकरणाच्या वैराण वाळवंटात तुझं पत्र मरुद्यान वाटलें. चिमण, तू काढलेले चिमटेही याही अवस्थेत हसवून गेलें. मला सोडून तू एकटेच लसीकरण केलेंस. त्यामुळेच तापलास लेका. ‘लस नव्हे तर तुला नर्स लक्षात राहिली,’ असें काऊ वहिनी फोनवरून सांगत होती. चावट कुठला. असो. हे विलगीकरण अगदी नकोसें झालेंय बघ. परवा ताप-खोकल्याचं निमित्त झालं नि आप्तेष्टांनी धोशाच लावला. कोरोना चाचणी करून घ्या म्हणून. शेवटी केली एकदाची चाचणी. ती सकारात्मक असल्याचा माझ्यासाठी नकारात्मक अहवाल मिळाला. अन् तोंडचें पाणी पळालें, त्यापाठोपाठ चवही गेली. नंतर वासही येणेंही बंद झालें. आप्तेष्टांनी खोलीत बंद करून टाकलेंय. नाश्ता-दोन वेळच्या जेवणाचं ताट दारातून आत सरकवतात. एखादा कैदी किंवा श्वापद झाल्यासारखा भास मला होतोय. खोलीत नुसता येरझाऱ्या घालत असतो. काळजी करू नकोस. येरझाऱ्या घालण्याने ऑक्सिजन काही कमी होत नाही माझा. उलट ऑक्सिमीटर आधी ९५ असेल तर येरझाऱ्यांनी ऑक्सिजन स्तर ९७ दाखवतो. ऑक्सिमीटरच्या चिमट्यात मी कायम बोट घालून बसतो, हा तुझा गैरसमज आहे. देव करो तुला कोरोना कधीही न होवो. नाही तर तू पाचही बोटांत ऑक्सिमीटर घालून त्या वेगवेगळ्या आकडेवारीची सरासरी काढत बसशील. पाचही बोटांत ऑक्सिमीटरचे चिमटे, काखेत एक अऩ् तोंडात एक थर्मामीटर ठेवून कानटोपी घालून बसलेला चिमण माझ्या डोळ्यांसमोर येतोय. (हास मेल्या. मी खोकतो.) अरे या उन्हाळ्यात वाफारे घेणे, गरम पाणी पिणे, गुळण्या करणे म्हणजे ‘काळ्या पाण्या’ची शिक्षा आहे रे. परवा खिडकीतून फळवाल्याला हातवारे करून फळे पाठवण्यास सांगत होतो. तर दाढीतील माझा अवतार ‘खिलौना’ चित्रपटातील खिडकीतील वेड्या संजीवकुमारप्रमाणे भासत होता, असें शेजारी सांगत होते. रस्त्यावरची दोन-तीन माणसे मला पाहून सैरावैरा धावत सुटली. असो. सध्या प्राणायाम सुरू आहे. जलनेतीचा प्रयोग फसला. नाका-तोंडात पाणी गेलं. माझ्या खोलीतच खोलवर बुडाल्याचा भास झाला. माझा सोटा घेऊन कोरोनाला झोडपावेसे वाटतेय. असो झेपेल तेवढें व्यायाम करतोय. लवकरच बरा होऊन उकडीचे मोदक चापायला येईनच तुझ्याकडे.
– तुझा गुंड्या.
– श्री अभय नरहर जोशी
abhayjoshi27@gmail.com
(लेखक ‘लोकमत’च्या पुणेआवृत्तीत मुख्य उपसंपादक आहेत.)
≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈
काल बऱ्याच दिवसांनी माझ्या वर्गमित्राचा फोन आला होता. भरपूर गप्पा झाल्या. अनेक जुन्या आठवणींना उजाळा मिळाला तशा अनेक खपल्याही निघाल्या.
“काय म्हणताहेत तुझी मुलंबाळं?” मी नेहमीचा प्रश्न विचारला आणि तो एकाएकी गंभीर झाला.
“यार… बरं झालं तू लग्न केलं नाहीस…” त्याने म्हटले आणि मी चाट पडलो. खरंय ना… जो माणूस ‘मिल्या… तूही उरकून टाक आता… किती दिवस संट्या राहणार?’ असं म्हणायचा त्याच्याकडून असे वाक्य अपेक्षितच नव्हते.
“कारे? काय झालं?” मी थोडं गंभीर होत विचारलं.
“यार… माझा मुलगा मागील वर्षी दहावीला होता. खूप हुशार आहे तो. पण त्याला आमच्या अपेक्षेप्रमाणे मार्क्स मिळाले नाहीत म्हणून त्याची आई त्याला थोडं जास्तच बोलली, तर तो एकदम गप्पंच झाला रे…” त्याने सांगितले.
“म्हणजे?”
“अरे आता तो ना कुणाशी फारसा बोलतो, ना हसतो, ना कोणत्या गोष्टीत समरस होतो. इतकेच काय पण त्याचे कॉलेज अॅडमिशन घ्यायलाही त्याची आई गेली होती. पहिले चार सहा दिवस आम्हाला फारसे काही वाटले नाही. म्हटलं राग आला असेल आईचा तर होईल ४ दिवसात गायब. पण आता दीड दोन महिने होत आले रे… पण त्याच्यात फरकच नाही. आम्ही समजावून बघितले, रागवून बघितले. इतकेच काय पण त्याच्या आईने त्याच्यापुढे हात जोडून माफीही मागितली. पण त्याच्यात काहीच फरक नाही.” मित्राने सांगितले आणि लक्षात आले की प्रकरण खरंच गंभीर आहे.
“तुलाही मी यासाठीच फोन केला. म्हटलं किमान तेवढा वेळ तरी ही गोष्ट मनातून जाईल आणि थोडं हलकं वाटेल.” त्याने म्हटले.
“मन्या… एक सांगू का? राग येणार नसेल तर?”
“काय ते बोल यार… आता राग लोभ या गोष्टींपेक्षा मला माझा मुलगा जास्त महत्वाचा आहे.” त्याने म्हटले.
“तू यासाठी एखाद्या मानसोपचारतज्ञाची मदत घे. त्यांना अशा गोष्टी चांगल्याप्रकारे हाताळता येतात. आणि लक्षात ठेव… मानसोपचारतज्ञाची मदत घेणे म्हणजे तो वेडा झालाय असे समजू नको.” मी सांगितले.
“हं… आता तोच एक पर्याय माझ्या समोर दिसतोय…”
“आणि हो… तुम्ही दोघेही टेंशन घेऊ नका. अजून तरी ही गोष्ट मला खूप गंभीर वाटत नाहीये. पण त्याकडे लक्ष दिले नाही तर मात्र गंभीर होऊ शकते…” मी म्हटले आणि फोन ठेवला.
मनात विचार आला… यार… दहावी तर आपलीही झाली. आईचे बोलणे आणि वडिलांचा मार आपणही खाल्ला, पण कधी आपल्या बाबतीत अशा गोष्टी का झाल्या नसाव्यात? बराच विचार केल्यानंतर लक्षात आले की याचे सगळ्यात मोठे कारण होते ते आपल्या पालकांनी आपल्याशी केलेले वर्तन. कोणती गोष्ट कशी हाताळायची हे त्यांना चांगलेच समजत होते. आजचा किस्सा त्याबद्दलच.
मी दहावीला असताना खूपच व्रात्य होतो. वर्षभर अभ्यासाकडे दुर्लक्ष आणि परीक्षेच्या महिनाभर आधी घोकंपट्टी ही माझी अभ्यासाची पद्धत. त्याचा कितपत उपयोग होणार? त्यामुळेच मी दहावी उद्धरेल असे इतरांनाच काय पण मलाही वाटत नव्हते. पण दहावीचा निकाल लागला आणि मी पास झालो.
संध्याकाळी माझे वडील घरी आले, त्यावेळी मी घराबाहेरच मित्रांशी गप्पा मारत होतो.
“काय रे… आज तुझा निकाल होता ना?” गाडी स्टँडवर लावतानाच त्यांनी प्रश्न केला.
“हो…”
“मग? काय झाले?”
“पास झालो…” मी काहीशा आनंदाने उत्तर दिले.
“छान… किती टक्के?”
“४७.१३%”
“इतके कमी?”
“हो…” माझ्या चेहऱ्यावर थोडी नाराजी आली.
मग बाकी काही न बोलता ते घरात गेले. १० मिनिटांनी आईने मला आवाज दिला. मी घरात गेलो तसे तिने माझ्या हातावर ५० रुपये ठेवले आणि सांगितले… ‘जा… पेढे घेऊन ये…’ मीही हुकुमाची अंमलबजावणी केली. पेढे आणल्यावर आधी देवापुढे ठेवले. नंतर देवाला तसेच आईवडिलांना नमस्कार केला, त्यांच्या हातात पेढा ठेवला आणि एक पेढा तोंडात टाकला.
“जा आता… बाकी पेढे कॉलेनीत वाटून ये…” आईने सांगितले. मी हातात पेढ्यांचा बॉक्स घेतला आणि वाटायला बाहेर पडलो.
“हे घ्या पेढे?” मी पहिल्याच घरात जाऊन म्हटले.
“अरे वा… पास झाला वाटतं?” त्या घरातील मावशींनी प्रश्न केला.
“हो… झालो ना…” मीही आनंदाने सांगितले.
“छान… किती टक्के?” पुढचा प्रश्न.
“४७.१३%” मी उत्तर दिले.
“फक्त? आणि तरीही पेढे वाटतोस?” त्यांनी म्हटले आणि मला अपमान झाल्यासारखे वाटले. मी तिथून काहीही न बोलता बाहेर पडलो. पुढील ३/४ घरातही मला असाच काहीसा अनुभव आला. शेवटी इतर ठिकाणी न जाता मी घरी आलो.
“इतक्या लवकर झाले पेढे वाटून?” आईने विचारले पण मी काहीच उत्तर दिले नाही, फक्त पेढ्यांचा बॉक्स आईच्या हातात दिला.
“अरे… यात तर पेढे आहेत अजून?” तिने बॉक्स उघडत म्हटले.
“हो… फक्त चार ठिकाणीच गेलो होतो…” मी काहीसे नाराजीने उत्तर दिले.
“का?” तिने विचारले आणि मी कोण काय म्हणाले हे सगळे सांगितले.
“अस्सं… ठीक आहे… पण आता बाकीच्या ठिकाणीही जाऊन ये. कुणी जर कमी मार्कांबद्दल काही म्हटले तर त्यांना सांगायचे… ‘यावेळी अभ्यास कमी पडला पण पुढील वेळी अजून प्रयत्न करेन…’ आणि हो… कुणालाही चिडून काही बोलू नको…” तिने सांगितले आणि मी त्याप्रमाणे उरलेल्या ठिकाणीही पेढे वाटून आलो.
घरी आलो त्यावेळी शेजारच्या आक्का घरी आलेल्या होत्या.
“काय रे… आला का सगळ्यांना पेढे वाटून?” आईने विचारले.
“हो… आलो…” मी म्हटले.
“मीरा… मिलिंदला इतके कमी मार्क मिळाले तरी तू त्याला पेढे वाटायला का पाठवलेस?” माझ्या देखतच आक्कांनी आईला विचारले.
“त्याला जीवनाचे धडे मिळावेत म्हणून…” आईने उत्तर दिले आणि मी विचार करू लागलो… यार… पेढे वाटणे यात कसला आलाय जीवनाचा धडा?
“म्हणजे?” माझ्याप्रमाणेच आक्काही विचारात पडलेल्या मला दिसल्या.
“अहो… तो पास झाला म्हणजेच त्याला यश मिळाले आहे. आणि जीवनात आनंदी राहायचे असेल तर अगदी क्षुल्लक यशही साजरे करता आले पाहिजे, म्हणून आम्ही पेढे आणले. त्यानंतर त्याला ते घेऊन लोकांकडे पाठवले. तिथे अनेकांनी त्याला विचारले ‘इतके कमी मार्क का?’ यातून त्याला हे समजेल की लोकांना यशापेक्षा जास्त अपयश दिसते आणि त्यालाच लोक अधोरेखित करतात. ज्यावेळी तो अशा गोष्टीने उदास होऊन घरी आला, मी त्याला अशा लोकांना काय उत्तर द्यायचे हे सांगून परत पाठवले. यातून तो हे शिकू शकेल की ज्यावेळी लोक आपला अपमान करतात किंवा आपल्याला कमी लेखतात त्यावेळी चिडून किंवा दुःखी होऊन समस्येपासून पळण्याऐवजी शांत राहून त्याचा सामना केला पाहिजे. बरे त्याला एकट्यालाच यासाठी पाठवले कारण त्याला हे माहित व्हावे की त्याने केलेल्या चुकांसाठी त्यालाच उत्तर द्यावे लागणार. पण त्याच बरोबर ‘काय उत्तर द्यायचे’ हे सांगून हेही दाखवले की ‘तो एकटा नाही, आम्ही कायम त्याच्या पाठीशी उभे आहोत.’ आणि सगळ्यात महत्वाचे… परीक्षा होऊन गेली आहे. निकालही हाती आला आहे. तो बदलणे कदापि शक्य नाही. मग चिडून किंवा दुःख करून काही उपयोग आहे का? नाहीच ना… त्यापेक्षा आहे त्या परिस्थितीचा स्वीकार करून पुढे जाणेच जास्त योग्य… पुढील वेळी तो नक्कीच जास्त मेहनत घेईल.” आईने सांगितले.
“मीरा… आता मात्र तू शिक्षिका होतीस या गोष्टीवर माझा पूर्ण विश्वास बसला…” आक्कांनी हसत म्हटले आणि आई देखील त्यांच्या हसण्यात सामील झाली.
खरे तर प्रसंग एकदम साधा होता. पण तो कायमसाठी माझ्या मनावर कोरला गेला. त्यानंतर अनेकदा अपयश आले, अनेकांनी दुषणे देऊन तर कधी अपमान करून माझे मानसिक खच्चीकरण करण्याचा प्रयत्न केला. पण अजूनपर्यंत तरी माझे मानसिक स्वास्थ्य बिघडल्याचे मला स्मरत नाही… आणि यापुढेही ते असेच टिकून राहील अशी अपेक्षा आहे.
– मानसिक स्वास्थ्य टिकविलेला नाशिककर, मिलिंद जोशी.
आशिया खंडातील सर्वात पहिले आणि सर्वात मोठे मानसोपचार रुग्णालय चेन्नईमध्ये आहे. ‘इन्स्टिट्यूट ऑफ मेंटल हेल्थ’ अशा नावाने भारतात सूप्रसिद्ध असलेल्या या संस्थेला आता सव्वादोनशे वर्ष पूर्ण होतील.
गेल्या दहा वर्षांपासून या इस्पितळात वेगवेगळ्या मानसिक विकारांमूळे त्रस्त असणाऱ्या रूग्णांवर एक अनोखा प्रयोग केला जात आहे, आणि ह्या उपचारप्रणालीला प्रचंड यश मिळल्याने ती झपाट्याने लोकप्रिय होत आहे. या उपचारांना ‘ग्रीन थेरपी’ म्हणजे ‘हरित उपचार’ असे म्हणतात.
यामध्ये मनोविकारांशी लढा देणाऱ्या व्यक्ती आपला संपूर्ण दिवस इस्पिळाच्या विस्तीर्ण आणि हिरव्यागार बागेमध्ये काम करण्यास सांगितले जाते.
असे मनोविकाररूग्ण जे वर्षानूवर्ष कधी कोणाशीही बोलले नाहीत, हसले नाहीत, ज्यांच्या सर्व भावना आटून गेल्या होत्या, ज्यांची जगण्याची इच्छाच मरून गेली होती, असे वेगवेगळ्या प्रकारचे रूग्ण जेव्हा हिरवीगार पाने, रंगबेरंगी फूले आणि कोमल हिरवळीच्या देखभालीमध्ये आपला दिवस घालवतात, त्यांच्यात आश्चर्यकारक बदल पहायला मिळतो.
निसर्गाची जादू अशी की उदासिनता, निराशा आणि गंभीर डिप्रेशन यासारख्या गंभीर आजारांनी त्रस्त असणाऱ्या व्यक्तीदेखील निसर्गाच्या सानिध्यात आपली दूःखे विसरू लागतात.
त्यांच्या चित्तवृत्ती प्रफूल्लित होतात. त्यांच्यात काम करण्याचा उत्साह आणि जोम येतो. भूतकाळात त्यांच्या मनावर झालेल्या खोल जखमा देखील हळूहळू वेगाने भरू लागतात, काही महिन्यांनी तर त्या जखमांचे व्रणही शिल्लक राहत नाहीत. जणू काही त्या व्यक्तीचा नवा जन्मच होतो.
ही निसर्गाची अद्भूत किमयाच म्हणावी लागेल की, केवळ काही महिने दररोज बागकाम केल्यामूळे माणसाच्या वाईट आठवणी पूसल्या जाऊन त्या रूग्णांमध्ये आनंदाचा झरा निर्माण होतो.
ज्यांनी वर्षानूवर्ष आपल्या मनोविकारांसाठी गोळ्या औषधे घेतली पण म्हणावा तसा फायदा झाला नाही, अशा रूग्णांचा देखील हरित उपचारांमूळे कायापालट झाल्याची अनेक उदाहरणे इथे पहायला मिळतात.
या संस्थेच्या संचालिका पूर्णा चंद्रिका सांगतात की मनोविकार रूग्णांनी ग्रीन थेरपीनूसार ठरवून दिल्याप्रमाणे नियमित बागकाम केल्यामूळे त्यांच्यातली एकाग्रता वाढल्याचे दिसून आले, फूप्फूसांना शूद्ध हवा मिळते, मेंदूला चांगल्या प्रमाणात ऑक्सीजन मिळतो. बागकामामूळे मनामध्ये आणि शरीरामध्ये उर्जेचा संचार झाल्याचा अनूभव येतो. त्यांचा मूड छान राहतो. चिडचिड, रागराग, कटू आठवणी, द्वेषभावना, संताप कूठल्याकूठे गडप होतात, न्युनगंड, भयगंड विरघळून जातात. निराशा, डिप्रेशन पळून जातात. रूग्णांनी सकारात्मक प्रतिसाद द्यायला सूरूवात केली की गोळ्याऔषधे देखील प्रभावीपणे आपले काम बजावतात आणि जलदगतीने रूग्ण बरा होण्यात यश मिळते.
बागकाम करून मनोविकारांना बरे करण्याची संकल्पना निजहल शोभा नावाच्या एका ट्रस्टमूळे इथे रुजली. २००७ मध्ये निजहल शोभा या संस्थेच्या प्रमूख शोभा मेनन सांगतात की हिरव्या हिरव्या वृक्षांमध्ये, त्यांच्या कोवळ्या पानांमध्ये, इथल्या रंगबेरंगी फूलांमध्ये आणि या चवदार फळांमध्ये निश्चितच मनाला प्रसन्न करण्याची जादू लपलेली आहे. फक्त मनोरूग्णांनीच नाही तर आनंदी जीवनाची आस असलेल्या प्रत्येक व्यक्तीने दररोज आपला काही वेळ अशा बागेमध्ये व्यतित केला पाहिजे. दिवसातून काही वेळ बागकाम करणे हे एक प्रकारे मनाच्या बॅटरीला रिचार्ज केल्यासारखे आहे. यातून मनाला सूखद गारवा मिळतो. आत्म्याला थंडावा मिळतो. निसर्ग आपल्याला एका अनामिक तृप्ततेची जाणीव करून देतो. एका आंतरिक शांततेची अनूभूती देतो. हा आनंद शब्दात वर्णन करण्यापलिकडचा आहे. जगातल्या प्रत्येक व्यक्तीला या ग्रीन थेरपीची गरज आहे.
गेल्या पंधरा वर्षांपासून निजहल चेन्नईमधील सार्वजनिक हरितपट्ट्यांचे जतन आणि संवर्धन करत आहे. हरित उपचारांचे महत्व पटल्यामूळे निजहलसाठी काम करणाऱ्या स्वयंसेवकांची वर्षागणिक वाढत गेली. आज मोठ्या संख्येने लोक वृक्षारोपणासाठी आणि त्यांच्या देखभालीसाठी एकत्र येतात. आधी त्यांना वाटायचे की आपण सामाजिक काम करत आहोत, पण आता ग्रीन थेरपी हा मनाला प्रसन्न करणारा उपचार असल्याचा अनूभव आला आहे.
आजकाल डॉक्टर आणि हॉस्पिटल म्हणलं की आपल्या पोटात गोळाच येतो, एखाद्या थ्री स्टार हॉटेलला लाजवतील, अशा अलिशान इमारती, तिथलं चकचकीत फर्निचर, लॉजसारख्या अलिशान खोल्या, तिथल्या सूखसूविधा, आवाक्याबाहेरचे उपचार, डोळे पांढरे होतील इतकी महाग औषधे, पांढरे कोट घालून सेवाभावाच्या गोंडस पांघरणाखाली पेशंटला मनसोक्त लूटणारी टोळी, एवढेच चित्र डोळ्यासमोर उभे राहते.
इंजेक्शन आणि सलाईनच्या सूया खूपसून हॉस्पीटलच्या पलंगावर लोळत पडणे, आणि भरमसाठ गोळ्या औषधांचा मारा सहन करणे हीच आज सर्वात मोठी मानसिक, शारिरीक आणि आर्थिक शिक्षा झाली आहे. जो स्वतःच्या शरीराची, प्रकृतीची हेळसांड करतो, त्या प्रत्येकाला भविष्यात त्याची जबरदस्त किंमत मोजावी लागते.
त्यापेक्षा सजग राहून स्वतःच्या आरोग्याची आणि पर्यायाने स्वतःच्या मनाची निगा राखणे हाच पर्याय आपण निवडायला हवा.
वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे, असे आपले साधूसंत सांगून गेले, पण हे वृक्षवल्ली नूसतेच सोयरे नाही तर किती चांगले डॉक्टर आहेत हे अनूभवण्यासाठी तरी आपण दिवसातून थोडा वेळ का होईना, बागकामामध्ये स्वतःला झोकून दिले पाहिजे.
एक सुंदर अनुभव. “मनातल्या घरात” (Self – Introspection)
आपण मनातल्या घराला कधी भेट दिली आहे कां ???
एका ठिकाणी बसून करमत नाही. मग उगाच आपण, इथे तिथे फिरायला जातोच की !!! मग ती पर्यटन स्थळ असतील किंवा कोणाच्या तरी घरी !!! याच्या त्याच्या घरी, या ना त्या कारणाने आपण पाहुणा म्हणून जातोच. मग मी ठरवले, कां नाही आपण आपल्याच मनाच्या घराचा पाहुणचार घेऊन यावा ???
हो, हो, चक्क स्वतःच्याच मनाच्या घरचा पाहुणचार !!! आपणच आपल्या मनाच्या घराला भेट द्यावी म्हंटले, बघावे तरी काय आणि कसं ठेवलंय हे मनाचे घर !!! कोण, कोण रहातात तिथे ??? कसे स्वागत होत ते ???
ठरल्याप्रमाणे मनाच्या घराच्या दारापर्यंत पोहचलो. अगदी छोटेसे होते, पण छान होते !!! आत काय असेल, या उत्सुकतेने दार वाजवले, तर आतून आवाज आला, “कोण आहे ???? काय पाहिजे ????” असा प्रश्न आतून विचारला जाईल याची कल्पना नव्हती पण खरंच आपण कोण आहोत, हे त्याला सांगितल्या शिवाय तो आपल्याला आत तरी कसा घेणार ???
मी ही सांगितले, “मी स्व आहे रे !!! ज्याचे तू कध्धी ऐकत नाही. ज्याच्याशी तू सतत वाद घालत असतोस, ज्याच्याशी तू दिवस रात्र गप्पा मारत असतो तो मी !!!”
आतून आवाज आला, ” बरं…. बरं…उघडतो दार !!!” दार उघडल्या नंतर आत पाहिले, तर गडद अंधार होता. म्हणून मी विचारले, ” कां रे एवढा अंधार ???” तेव्हा तो म्हणाला, ” तुमच्याच कृपेने !!! मी म्हंटले, ” माझ्या कृपेने ??? तर तो म्हणाला, “हो !!! तुझ्याच कृपेने !!! कारण इथे उजेड तेव्हा पडेल, जेव्हा तू सकारात्मक विचारांचे दिवे लावशील.”
मी ही जरा ऐटीतच म्हणालो, “ठीक आहे… ठीक आहे !!! लावतो दिवे” म्हणत, पुढे सरकलो. थोडं पुढे चाचपडत गेलो तर काय !!! तिथं असंख्य खोल्या होत्या. अगदी कोंदट वातावरण होते. मी त्याला पुन्हा विचारले, “काय रे, त्या खोल्यात काय दडलंय ???”
तो पुन्हा म्हणाला, ” बघ की उघडून एक एक खोली, कळेल काय आहे ते.” मग मी हळूच एका खोलीचे दार उघडले. आणि…फडफड करत अनेक रागीट चेहरे समोर आले. जणू काही ते मला गिळंकृतच करणार आहेत. मी पटकन दार लावले. तेव्हा तो म्हणाला, ” काय झालं ??? दार कां लावले ???” मी म्हंटले, ” कसले भयानक होते रे ते !!! ” तर तो पुन्हा हसत म्हणाला, ” तुम्हीच गोळा केले आहेत ते !!! तुम्ही ज्यांचा ज्यांचा तिरस्कार करता, ज्यांचा राग करता, त्यांची संख्या किती आहे ते कळलं कां ??? तुम्हीच केलेली मेगा भरती आहे ती !!!”
हुश्श…..अरे बापरे !!! पुढचं दार उघडायचे धाडसच होईना, पण म्हंटले आता आलोच आहे तर उघडावे. तिथे ज्या काही घटना पहिल्या त्याने तर घामच फुटला. तो पुन्हा मिस्कीलपणे म्हणाला, ” काय, काय झालं… ??? मी म्हंटले, “अरे बाबा, हे काय ??? तो पुन्हा म्हणाला, ” तू तुझ्या आयुष्यात सतत दुःखद आठवणीच गोळा करीत गेलास, त्याला मी तरी काय करणार ??? आता तर साठवून ठेवायला या खोल्यासुद्धा अपुऱ्या पडत आहेत.”
तिथं अशा किती तरी खोल्या होत्या, ज्यांना उघडायच धाडस माझं झालं नाही. मग त्याने त्या उघडून दाखवल्या, ही भीतीची खोली, ही द्वेष, ईर्षा, वाईट विचारांची, मतभेदांची, गैरसमजांची खोली अशा अनेक खोल्या पाहिल्या, सर्वच्या सर्व अंगावर येत होते.
आता मात्र माझं डोकं गरगरायला लागले, अस्वस्थता वाढली होती. किती भयावह होत ते सर्व !!! त्यामुळे पुढं काय आहे, हे बघण्याची इच्छाच होत नव्हती. हे सारं भयाण बघून अंगाला काटा आला होता. स्वतःचाच तिरस्कार वाटत होता.
मी त्याला म्हंटले, “मी जातो आता. मला काही बघायचं नाही आता.” तो म्हणाला, ” थोडं…थांब, आलाच आहेस तर हे पण बघून जा.”
थोडी हिंमत दाखवत आम्ही पुढच्या दिशेने निघालो….तिथं संपूर्ण जाळ लागलेला होता…मग थोडं पुढे गेलो आणि पाहिलं तर काय….आहा…..हा हा…स्वर्ग सुख मिळावं असं वातावरण होत, तिथं प्रेम होतं, तिथं माया होती, तिथं आनंद होता, उत्साह होता, नवीन नवीन कल्पनांचा बाजार होता. सुख, समाधान शांती ने भरलेले, अगदी नयन दिपून टाकेल असं सर्व काही होते.
मी म्हंटले, “काय रे हे इतकं सुंदर आहे, हे तू मला आधी कां नाही दाखवलं ???” तर तो मिस्कील पणे हसत म्हणाला, ” अहो, तुमचं मनातलं खरं घर तर हेच आहे.” मग मी म्हणालो, ” जे आधी पाहिलं, ते काय होतं ???” तो पुन्हा हसत म्हणाला, ” त्या…त्या…तुम्ही अतिक्रमण करत वाढविलेल्या खोल्या आहेत. तुम्ही केलेला राग, इर्षा, द्वेष, भीती, नावडती माणसं, नावडत्या आठवणी याची जी साठवणूक केली, ती या सुंदर घराच्या प्रवेशद्वारा पुढे पहारेकरी बनून बसले आहेत, जे तुम्हाला इथं पर्यंत येण्यास अडवत आहेत.”
क्षणभर विचार केला, खरंच की आपणच आपल्या सुख, आनंदाच्या कडे जाणारा रस्ता, या नकारात्मक गोष्टींची साठवणूक करून अडवलेला आहे. मनाच्या घराचा पसारा आवरायला वेळ लागणार होता पण ठरवलं की, आता या अडथळा बनून बसलेल्या खोल्यांची साफसफाई करायची. तिथं सकारात्मक विचारांचे दिवे लावायचे आणि सुख समाधान, शांती कडे जाणारा मार्ग सोपा करायचा.
बरं झालं. आज मनाच्या घरात फिरून आलो, नाहीतर आपल्या मनावर नकारात्मक विचारांचे अतिक्रमण झालेले आहे हे कळलंच नसतं.
मनाच्या घरचा पाहुणचार खूप काही शिकवून गेला. आपल्या मनाचं घर, दुसऱ्याच्या हातात द्यायचं नाही. स्वतःच्या घराची साफसफाई स्वतःच करायची.
संग्राहक – सुश्री मीनल केळकर
≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈
आम्ही राहत असलेल्या त्या इमारतीत खालच्या दोन सदनिकाच भाड्याने दिल्या होत्या. वरच्या दोन सदनिका मोकळ्याच होत्या. बँकेतील अधिकारी, सरकारी अधिकारी, अशा व्यक्तींची काही कालांतराने बदली होतेच. त्यामुळे मालकानी अशा व्यक्तींनाच घर भाड्याने देण्याचे ठरविले होते. आम्हीही बदलीमुळे या शहरात आलो होतो. त्या सदनिका ऐसपैस, चांगल्या होत्या. तेथे आम्ही आमचा बाड-बिस्तरा हलवला.
शेजारी एक जण राहतात एवढंच ठाऊक होतं. पुढे सामान लावल्यावर सवड झाली तेव्हा कळले की आपले शेजारी आयकर अधिकारी राहतात. त्यांची मुले माझ्या मुलांपेक्षा वयानं मोठी होती. मुलांच्या आई फारशा कोणात मिसळत नसत. पण बोलक्या होत्या. त्यानंतरही दोन कुटुंबे येऊन गेली.
नंतर खालच्या सदनिकेत एक बँक अधिकारी राहायला आले. वरच्या मजल्यावरची सदनिकाही दिली गेली. शैला, तिची दोन लहान मुले, यजमान, एवढेच मर्यादित कुटुंब होते. ते व्यावसायिक होते. खाली राहणाऱ्या बँक अधिकाऱ्यांशी त्यांची आधीपासून ओळख होती. शैलापेक्षा मी प्रौढ होते. तिचा लहानबाळ श्रेणिक सहा महिन्यांचाच होता. आम्हाला लहान मुलांची आवड असल्याने तो आमच्याकडे बरेच वेळा असे. त्याला आमचा लळा लागला होता. शैला कर्नाटकातील होती. सुरुवातीला तिला मराठी भाषा अवगत नव्हती. हळूहळू बोलायला शिकली.
ती स्वयंपाकात, लहान वय असूनही सुगरण होती. करणं-सवरणं, सर्वच पदार्थ खमंग होत. ती नेहमी असे खमंग पदार्थ घेऊन येई. तिची वांग्याची भाजी अजूनही जिभेवर रेंगाळते. आता स्वत:ची घरे झाली. सहवासात अंतर पडलं. खायचा योग येत नाही. मुले म्हणतात एकदा शेटे काकूकडूनच वांग्याची भाजी करून आण. आमची मनं छान जुळली होती.
सगळ्या जणीच अशा सरमिसळून वागणाऱ्या असतातच असे नाही. नवीन शेजारीण कुलकर्णी वहिनीही अशाच मिसळून जातील असे वाटले होते. आता शेजार मिळाल्याने मी आनंदात होते. सर्वांनी एकत्र यावं. अंगतपंगत करावी. सणासुदीला एकमेकांनी सण साजरा करावा, अशी विचारसरणी मी बाळगून होते.
माझी फार वर्षांपूर्वीची पद्मा ही मैत्रीण ह्याच गावात बदलून आली होती. ती ह्यांच्या ऑफीसमधील मित्राची बहीण होती. ठाण्यात असताना हे मित्र आमचे शेजारीच राहत. तीही मधूनमधून भावाकडे येई. त्यामुळे आमची ओळख मैत्रीत रूपांतरित झाली. तिचा आमचा पाठशिवणीचा खेळ चालू होता. आमची बदली कोल्हापूरला झाली. तीही कोल्हापुरात बदलून आली. इथे सांगलीतही आम्ही मागे-पुढे दाखल झालो. त्यामुळे पुन्हा मैत्रीचे धागे जोडत होतो.
पद्मा उत्तम लोकरीचे स्वेटर, मफलर मशीनवर करीत असे. तशी ती कलाकारच होती. आम्ही तिचे कौतुक करीत असू. मी कधीतरी करून आणलेला स्वेटर घातला की सर्व जण विचारीत कोठे घेतला. किती छान आहे.
असेच एकदा शेजारी गप्पा मारताना, स्वेटरचा विषय निघाला. नवीन आलेल्या कुलकर्णी वहिनीही होत्या. त्यांनाही तो स्वेटर आवडला. मी त्यांना माझ्या मैत्रिणीचा स्वेटर करण्याचा व्यवसाय असल्याचे सांगितले. त्यांनी माझ्याकडे पद्माचा पत्ता विचारून घेतला. मधले काही दिवस मी माझ्या दैनंदिन कामात व्यग्र होते. मधल्या काही दिवसांत आम्ही शेजारणींची गप्पाष्टकेही रंगली नाहीत. एके दिवशी, कुलकर्णी वहिनी, येऊ का, म्हणत घरी आल्या. मी म्हटलं, “आवरलं सकाळचं सगळं!” त्या “हो” म्हणाल्या. थोड्या वेळ इकडल्या तिकडल्या गप्पा झाल्या. बोलता, बोलता त्यांनी त्या पद्माकडे स्वेटर करायला दिल्याचेही सांगितले. पुढे आणखीन काहीतरी त्यांना सांगायचे होते. मी चहा करायला आत गेले. चहा पिऊन झाल्यावरही त्या घुटमळत होत्या. त्या पद्मा वहिनी आहेत ना. “त्या तुमच्याविषयी सांगत होत्या!”
“काय सांगत होत्या?” मी विचारले. “तुम्ही ठाण्याला त्यांच्या भाऊ-वहिनी शेजारीच राहत होतात ना!” मी हो म्हटले. मग तेव्हा तू-तुम्ही म्हणे त्यांच्या भावजयीला, नणंदेशी चांगले वागू नका असे सांगत होता. “कशाला चोळी-बांगडी करता, काही देऊ नका वगैरे वगैरे. हे खरंच त्यांनी मला सांगितले. मी म्हटलं, “अहो, असे ती म्हणणार नाही. आमचे खूप वर्षांचे संबंध आहेत. तुमचा ऐकण्यात गैरसमज झाला असेल!” त्या नंतर घरी गेल्या.
मनातून मी अर्धमेली झाले. जिच्याबरोबर एवढ्या वर्षांची ओळख आहे. दोघी शिवण क्लासला बरोबर जात होतो. कोल्हापूरलही जवळजवळ राहत होतो. कशावरून कधीच धुसफूस झाली नाही. ह्या कुलकर्णी वहिनी अंगचेच काही सांगतात की पद्मा तसे…? मी कधीच चुगल्या खाल्ल्या नाहीत असे शिकवायला, त्या वेळी मी नवविवाहित, पोरसवदा होते. तिच्या वहिनी सहा मुलांची आई. हे पटणारच नव्हतं. कळ लाव्या नारदाची भूमिका मी कधीच केली नाही. आजपर्यंत हे तत्त्व पाळलंय. ज्येष्ठ नागरिक असून पुढच्या हयातभर ह्या तत्त्वाशी एकनिष्ठच राहीन.
थोडे दिवस मनस्ताप झाला. काही सुचत नव्हतं. पद्मा, तिच्या वहिनी साऱ्यांचे चेहरे डोळ्यांपुढे नाचत. जे कधीच केले नाही त्याचे बालंट माथी का घेऊ? मग सरळ पद्माकडे जायचे ठरविले. तिला विश्वासात घेऊन, कुलकर्णीबाईंचे वक्तव्य सांगायचे. त्या दिवशी तिच्या घरी गेले. तिचे यजमानही घरीच होते. मी सर्व हकिकत दोघांना सांगितली. दोघांनाही धक्काच बसला. तिच्यावरही हा नसता आरोप केल्यासारखे झाले होते. माझ्याविषयी तिचे असे मत कधीच नव्हते. त्यामुळे, गैरसमजाचं मळभ दूर झाले. मनावर आलेला ताण एकदम ओसरला. आम्हा दोघींत पूर्वीचा जिव्हाळा, आपुलकी व प्रेम तसेच राहिले. पुढे उलट अधिक गडद झाले. पुढे माझ्या बॅडमिंटन ग्रुपला तिला जोडून घेतले. तिची बदली पुण्यात झाली तरी आम्ही भेटत राहिलो. आमचं नातं रेशीमबंधांनी बांधलेलं घट्टच होतं. ते काही कोणाच्या साध्या माऱ्यानं तुटणार होतं थोडंच!
या इमारतीत वरच्या सदनिकेत राहणारी शैला अशीच काही दिवसांकरिता माझ्यापासून दूर केली गेली. तिच्या समभाषिक या भगिनींनी येऊन तिला आपलंसं केलं. पुण्या-मुंबईसारख्या शहरात राहिल्याने नोकरी केल्यामुळे, अंगी तरतरीतपणा बाणला होता. दुचाकीवरून पटापट कामे करायला जाणे, बॅडमिंटन खेळणे, तीन मुलं असूनही उरकून सगळ्यात पुढे असणे, असे इतरांपेक्षा वेगळेपणही काहींना खुपत असते. बायकांचा हेवा, मत्सर करण्याचा अनादिकालापासूनचा स्वभाव, आर्थिक बाबतीत केलेली तुलना इत्यादी अनेक क्षुल्लक कारणांकरिता ‘बायका एकमेकींना पाण्यात पाहतात. त्यामुळे चांगली नाती जोपासणं, बांधणं वेळप्रसंगी अवघड होतं. उलट मनावर तणावच वाढतो.
माझे तसेच झाले. या नव्या शेजारणींनी शैलाला आपलंसं केलं. आपल्या गटात ओढून घेतलं. मला, माझ्या मुलांना बाजूला टाकलं. पण मी स्थितप्रज्ञ राहण्याचा प्रयत्न केला. माझ्या दैनंदिन कामात, खेळात स्वत:ला गुंतवून ठेवले. एकमेकींशी हसत-खेळत वागावे. मोकळेपणे बोलावे. याला काही पैसे पडत नाहीत. पण या नव्या शेजारणीचा दुही पाडण्याचा अनुभव मनाला टोचत राहिला.
पुढे या बदलीवाल्या, आपलं बिहाड-बाजलं घेऊन नवीन ठिकाणी गेल्या. आमच्या स्मरणातूनही त्या गेल्या. आम्ही दोघी मात्र या गावचेच होऊन राहिलो. शैला माझी शेजारीण घरच्या सारखीच राहिली आहे. तिला माझ्या जुन्या भिशीत जोडून घेतलं आहे. लांब राहत असलो तरी भिशीच्या माध्यमातून निदान महिन्यातून एकदा भेटतोच.
मध्यंतरी माझ्या सासूबाई अत्यवस्थ आजारी होत्या. ते इस्पितळ शैलाच्या घराजवळच होते. त्यादिवशी मी रात्री घरी जाऊ शकत नव्हते. हक्काने दोन घास जेवायला तिच्या घरी गेले. पुढचे काही दिवस ती सकाळचा नाश्ता घेऊन माझ्याकडे इस्पितळात येत असे.
मैत्रीची, नात्यातील माणसामाणसांतील प्रेमाची, स्नेहाची, आपुलकीची रेशीमबंधने विणली जातात. घट्ट धागे जुळतात कधी न तुटण्यासाठी, क्षणैक आलेल्या वादळामुळे, कु-प्रवृत्तीच्या माणसांमुळे थोड्या कारणाकरिता जरी तुटायचे म्हटलं तरी इतके चिवट असतात की ते तुटत नाहीत आणि तुटले तरी पुन्हा जोडले जातात. चरख्यावर सूत काढताना धागा तुटला तर आपण पुन्हा दोन धागे बेमालूम जोडतोच ना. तशी ही मनं पुन्हा सांधली जातात, जुळतात. जगाची रीतंच आहे तशी!
☆ रेस्टींग पिरियड…… नात्यांमधला !!! ☆ सुश्री स्वाती देव ☆
बागकाम हा माझा ठआवडता छंद असल्यामुळे बागकामाचे व्हिडिओ बघत होते. अनेक plants ची माहिती करून घेत होते. त्यांच्या वाढीविषयी किंवा त्यांच्या संगोपना विषयी माहिती वाचताना एक शब्द बऱ्याच वेळा येत होता. तो म्हणजे रेस्टींग पिरियड. साधारणतः हिवाळ्यामध्ये त्यांचा रेस्टिंग पिरियड असतो. त्या कालावधीमध्ये खत अजिबात घालायचं नसत, पाणी कमीत कमी देतात. काही काही झाडांच तर हार्ड प्रूनिंग किंवा कटिंग करून टाकतात. सगळी पाने काढून टाकतात. म्हणजे बर्यापैकी हार्श ट्रिटमेंट त्यांना दिली जाते असे मला वाचताना वाटले. म्हणजे एखाद्याला झाडांबद्दलची ही पुरेशी माहिती नसेल तर झाडांचे बहरणे बंद झाल्यावर तो सोसासोसाने त्याला खतपाणी घालत बसेल, उन्हातली कुंडी सावलीत ठेवेल, सावलीतली ऊन्हात ठेवून बघेल आणि तरी शेवटी फुलं येत नाही म्हणून दुःख करत बसेल. पण या हक्काच्या रेस्टिंग पिरियडनंतर ज्या जोमाने झाडं बहरतात हे वाचल्यानंतर मनात एकदम विचार येऊन गेला की नात्यांच पण असंच असतं का ?
नात्यांना आपण मायेचं, प्रेमाचं, विश्वासाचं खतपाणी घालत असतो आणि ती हळूहळू बहरतात पण कधीकधी या गोष्टींचा समतोल बिघडतो. कधी जास्त गृहीत धरल जातं, कधी अति काळजी केली जाते, कधी हक्क दाखवला जातो. काय आणि कसं पण हे नातें हळु हळू नाजूक, कमकुवत व्हायला लागत. मग अचानक कधीतरी छोटीशी वाटणारी कृती किंवा अजाणतेपणी गेलेला एखादा शब्द हे पुरेसं ठरतं आणि ते नातं एकदम शॉक मध्ये जातं. मग अशा वेळेस हा चक्क नात्यांमधला रेस्टिंग पिरियड आहे असं मानायला काय हरकत आहे ? मग अशावेळी जाणीपूर्वक संवाद थोडा कमी झाला तरी हरकत नाही, वारंवार भेटणं व्हायला पाहिजेच असं नाही, गरजेपुरताच संवाद झाला तरी काही बिघडत नाही. नेमकं काय चुकलं असेल याचा विचार करून, योग्य तो बोध घेऊन, आपण स्वतः चुकलो असलो तर आपल्याला स्वतःला सुद्धा माफ करून शांत राहावे. अगदीच तशी गरज पडलीच तर आपण आहोतच एकमेकांना एवढा विश्वास पुरेसा आहे. कालांतराने मन किंवा नाती पुन्हा जुळतील याबद्दल मला तरी खात्री वाटते.
मात्र कधीकधी बसणारा शॉक हा मोठा असतो. नुकत्याच आमच्या गच्चीमध्ये माळीबुवांकडून सगळ्या कुंड्या repoting करून घेतल्या. पूर्ण झाडं काढून त्याची मुळांची छाटणी करून ती गरजेनुसार मोठ्या कुंड्यांमध्ये लावली. काही काही झाडांना पालवी फुटायला सुरुवात पण झाली पण काही झाडं मात्र ढिम्मच. त्यांच्यात जिवंतपणाची काही लक्षणे दिसत नव्हती. मला चाळाच लागला होता रोज एकदा त्या वाळलेल्या झाडांकडे जाऊन निरीक्षण करायचं कुठे जिवंतपणाची निशाणी दिसतेय का ते. दोन तीन झाडांची तर मी आशाच सोडून दिली होती पण आता सीझन बदलल्यानंतर अचानक मला त्यांच्यावर इवलिशी फूट दिसायला लागली. ज्या झाडांची मी आशा सोडून दिली होती त्या प्रत्येकाला पालवी फुटलेली आहे. थोडक्यात नात्यात सुध्दा शॉक मोठा असेल तर वेळ पण जास्त लागेल पण ते पूर्ववत मात्र नक्की होईल असा विश्वास वाटतो.
एवढं सगळ असलं तरी जसं आपण अमरपट्टा घेऊन आलो नाहीये तशी काही नाती सुद्धा अमरपट्टा घेऊन आलेली नसतात, त्यांचीही एक्सपायरी डेट असतेच की. त्यांचा सुद्धा मृत्यू होतो. तसं झालंच तर मग त्या वेळेस मात्र तोही शांतपणे स्वीकारावा.
हे सगळे माझ्या स्वतःच्या अनुभवातून मनामध्ये उठणारे तरंग आहेत. निसर्ग आणि माझं अचपळ मन यात मला कुठेतरी संगती दिसली, ती शब्दांत उतरवली….
☆ ओंजळीतली चांदणफुले – सौ. पुष्पा जोशी ☆ प्रस्तुति – श्री प्रमोद वर्तक ☆
पुस्तकाचे नाव – ओंजळीतली चांदणफुले
लेखिका – सौ पुष्पा जोशी
प्रकाशक – राजा प्रकाशन, मुंबई.
पाने – १०४
किंमत – रु १२५
जीवनसेतू
अनादिकाळापासून मानवाला जीवनाबद्दल प्रेम आहे, ओढ आहे. जीवनाविषयी त्याच्या मनात दडलेले कुतूहल त्याला नव्या नव्या वाटा शोधण्याची उर्मी देते. साहस करण्याची वृत्ती आणि प्रवास करण्याची प्रवृत्ती यामुळे मानवाने दळणवळणाच्या अनेक सोयी व साधने निर्माण केली आहेत. त्यातील पूर्वापार साधन म्हणजे ओढे, नद्या, खाड्या, समुद्र ओलांडून जाण्यासाठी बांधलेले अनेक प्रकारचे पूल! रामायण काळातील वानरसेनेने श्रीरामांसाठी बांधलेला समुद्रसेतू म्हणजे दुष्ट शक्तिचा विनाश करण्यासाठी समूह शक्तिने उभारलेला सेतू होता.
लहान गावांमध्ये पावसाळी झरे, ओढे किंवा पाण्याचे छोटे प्रवाह ओलांडण्यासाठी झाडांचे मजबूत ओंडके किंवा बांबू त्या प्रवाहावर बसवून साकव घालण्याची पद्धत आहे. हिमालयातील कितीतरी दुर्गम गावांमध्ये पोहचण्यासाठी अनेक खळाळते ,रुंद प्रवाह ओलांडावे लागतात. तिथे प्रवाहच्या दोन्ही तीरांना जोडणारा एक मजबूत लोखंडी दोर बांधलेला असतो. त्यावरील कप्पीच्या सहाय्याने बांबूच्या टोपलीत बसून ते प्रवाह पार केले जातात.
इंग्रजांना मुंबई बेट आंदण मिळाले. त्यांचा पसारा वाढू लागला तेव्हा त्यांनी माहिम- वांद्रे इथल्या खाडीमध्ये भर घालून तेव्हाची बेटे जोडण्यासाठी पूल बांधले. वसई -भाईंदरच्या खाडीवरील रेल्वेचा जुना पूल इंग्रजी आमदानीतला आहे.शंभराहून अधिक वर्षे इमानेइतबारे सेवा करुन तो पूल आता निवृत्त झाला आहे. त्या खाडीवर आधुनिक तंत्रज्ञानाने बांधलेले दोन नवीन पूल पाहत तो सेवानिवृत्त पूल स्थितप्रज्ञासारखा उभा आहे. असाच एक जुना जाणता पूल म्हणजे कोलकत्याचा हावडा ब्रिज. तिथेही आता एकावर एक दोन नवीन पूल बांधण्यात आले आहेत. दुसऱ्या महायुद्धातील एका घटनेवर आधारित ‘ब्रिज आॅन द रिव्हर क्वाॅय’हा एक गाजलेला युद्धपट होता.
ब्रह्मपुत्रा नदी(नद)वर बांधलेला साडेतीन किलोमीटरचा पूल ही आपल्या लष्करी अभियंत्यांची करामत आहे. त्या पुलावरून ब्रह्मपुत्रेचा वेगवान खळाळता प्रवाह ओलांडताना मानवी जिद्द व तंत्रज्ञान यापुढे आपण नतमस्तक होतो. वांद्रे- वरळी सी लिंक ब्रिज हा मुंबईचा मानबिंदू आहे. या सागरी सेतूवरील सहा मिनिटांचा प्रवास म्हणजे भारतीय अभियंते, तंत्रज्ञ, कामगार व त्यांना साथ देणारे देशी-परदेशी हात यांच्या जिद्दीची, श्रमाची यशोगाथा आहे. रात्री प्रकाशाने उजळून निघणाऱ्या त्यावरील त्रिकोणाकृती केबल्स म्हणजे अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या फडफडणाऱ्या सोनेरी-रुपेरी पताकाच! अशा अनेक पुलांमुळे वाहतुकीच्या सोयी सुविधांमध्ये भर पडते हे निश्चित पण असे पूल बांधत असताना मजुरांपासून ते वरिष्ठ अभियंत्यांपर्यंत सर्वजण आपला जीव धोक्यात घालून ही कामे उभी करीत असतात. सागरी सेतू बांधताना समुद्राची भरतीओहोटीची वेळ सांभाळणे, निसर्गाच्या लहरीमुळे केलेले काम फुकट जाणे, मेट्रो रेल्वेसाठी पूल बांधताना जमिनीच्या पोटात खूप खोलवर उतरून कामे करणे या प्रकारचे अनेक धोके असतात. अशा कामांवर होणाऱ्या अपघातात जीव गमावलेल्यांची संख्या बरीच मोठी असते. या सोयी सुविधांचा वापर करताना आपण या साऱ्यांची कृतज्ञ आठवण ठेवली पाहिजे.
मेघालयची राजधानी शिलाॅऺ॑गहून थोडे दूर घनदाट जंगलात एक ‘लिव्हिंग रूट ब्रिज’ आहे. दगड, गोटे यांनी भरलेल्या मोठ्या खळाळत्या ओढ्याच्या दोन्ही बाजूला जंगली रबराची झाडे आहेत.( या झाडांपासून रबर मिळत नाही.) या रबर प्लांटची जाडजूड, लांब , भक्कम मुळं ओढ्यामध्ये बांबू रोवून त्यावरून एकमेकात गुंफली आहेत.मुळांच्या कित्येक वर्षांच्या वाढीमुळे, तसेच त्यांना दिलेला आधार व आकार यामुळे त्या मुळांचा मजबूत डबलडेकर ब्रिज तयार झाला आहे.आसपासचे गावकरी ओढा ओलांडण्यासाठी त्या पुलाचा उपयोग करतात. कित्येक ट्रेकर्स त्या पुलावरून चालण्याचा थरार अनुभवतात. परदेशी प्रवाशांना या ‘लिव्हिंग रूट ब्रिज’ चे खूप आकर्षण आहे .कारण जगात फारच क्वचित ठिकाणी असे जिवंत पूल आहेत. गणित आणि विज्ञान यांची उत्तम सांगड घालणारा कीटक म्हणजे मुंगी. जंगलातील जवळ जवळ असलेल्या दोन उंच झाडांवरून खाली-वर करण्याऐवजी या मुंग्यांनी आपले डोके वापरून झाडांची पाने व तंतू यांचा वापर करून आपल्या कामसू वृत्तीने या दोन्ही झाडांना जोडणारा पूल तयार केला होता आणि त्यावरून त्यांची शिस्तबद्ध वाहतूक सुरू होती.
थेम्स नदीवरील लंडन ब्रिजशिवाय लंडन चे चित्र पूर्ण होत नाही. मावळत्या सूर्यकिरणात अमेरिकेतील सॅन फ्रान्सिस्कोचा गोल्डन ब्रिज झळाळत असतो. जपानमधील अकाशी इथला सस्पेन्शन ब्रिज हा गोल्डन ब्रिजहूनही मोठा आहे. स्वीडनमध्ये पंधरा पुलांच्या खालून आमची क्रूझची सफर होती. त्यातला एक ब्रिज संपूर्ण तांब्याच्या पत्र्याने बांधलेला आहे. सूर्यकिरणे त्यावरून परावर्तित होऊन त्याचे लालसर प्रतिबिंब खालच्या पाण्यात पडले होते. कोपनहेगन या डेन्मार्कच्या राजधानीच्या शहरातून एक चिमुकली नदी वाहते. तिच्यावर चारशे वर्षांपूर्वी बांधलेला पूल चक्क संगमरवराचा आहे. त्याचा पादचारी पूल म्हणून अजूनही वापर होतो. तुर्कस्तान मुख्यतः आशिया खंडात येतं. पण तुर्कस्तानमधील इस्तंबूलचा थोडासा भाग युरोप खंडात येतो.इस्तंबूलच्या एका बाजूला असलेल्या बास्पोरस या खाडीवरील पुलाने युरोप आणि आशिया हे दोन खंड जोडले जातात. या खाडीवरील क्रूझ सफारीमध्ये युरोप आशियाला जोडणारा हा सेतू छोट्या-छोट्या लाल निळ्या दिव्यांनी चमचमत असताना दिसतो.
जीवन व्यवहार सोयीस्कर होण्यासाठी मानवाने जसे अनेक पूल बांधले तसेच जीवनगाणे अर्थपूर्ण होण्यासाठी मानवाला सहृदयतेचे सेतू उभारणे आवश्यक असते. जीवनामध्ये संकुचितपणाच्या भिंती उभारण्यापेक्षा मैत्रीचे पूल उभारणे हे केव्हाही श्रेयस्कर ठरते. काही विशिष्ट कामाकरता माणसे एकत्र येतात तेव्हा त्यातून तात्पुरत्या सहवासाचे साकव उभारले जातात. तर कधी त्यातूनच प्रदीर्घ मैत्रीचे पूल उभे राहतात. पती-पत्नीमधील भावबंधनाचा पूल, कौटुंबिक नात्यांचा जिव्हाळ्याचा पूल भक्कम असावा लागतो. समाजकार्य उभे करताना क्रियाशील कार्यकर्त्यांचा समविचाराचा पूल असतो. समान छंद, आवडीनिवडी असणारे त्यांच्या त्या छंदामुळे एकत्र येऊन त्यातून मैत्रीचा पूल बांधला जातो. राष्ट्रा- राष्ट्रातील वैज्ञानिक प्रगती, माहिती- तंत्रज्ञान यांच्या वाहतुकीचे पूल हे जग जोडणारे असतात. मानवाच्या प्रगतीला नव्या दिशा दाखविणारे असतात.
माणसा माणसांमधल्या या पुलांना सामंजस्याचे भरभक्कम खांब असावे लागतात. गैरसमज, कटुता, द्वेष, अहंभाव यांच्या भिंती टाळता आल्या तरच हे पूल उभे राहतात. वेळप्रसंगी आपला अट्टाहास बाजूला ठेवण्याचा, आपल्या मतांना मुरड घालण्याचा, सहनशीलतेचा टोल या पुलांसाठी भरावा लागतो. अशा मानवी पुलांवर एखादं हक्काचं, आपुलकीचं विश्रांतीस्थान असेल तर तिथे थोडावेळ थांबून गतप्रवासाचा आढावा घेता येतो आणि पुढील वाटचालीसाठी नवी उमेद, मार्गदर्शन, शक्ती मिळते.
मानवनिर्मित, निसर्गनिर्मित आणि सुरेल मानवी जीवनासाठी आवश्यक अशा या पुलांचे वैशिष्ट्य म्हणजे या सर्व पुलांना स्वतःची अशी एक गती असते.लय असते. ही लय,ही गती म्हणजे जीवन वाहते ठेवण्याचा मूलमंत्र असतो.ही लय ज्याला सापडली त्याचे जीवन गतिमान, प्रवाही ,आनंदी होते आणि ही लय जीवनाला विलयापर्यंत सांभाळून नेते.
प्रस्तुति – श्री प्रमोद वर्तक
सिंगापूर
मोबाईल-9892561086
≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈