मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ एकच कविता मराठीच्या २८ बोली भाषांमध्ये ! – भाग पहिला ☆ प्रस्तुति – श्रीमती उज्ज्वला केळकर

श्रीमती उज्ज्वला केळकर

? वाचताना वेचलेले ?

☆ एकच कविता मराठीच्या २८ बोली भाषांमध्ये ! – भाग पहिला ☆ प्रस्तुति – श्रीमती उज्ज्वला केळकर☆ 

 एकच कविता मराठीच्या २८ बोलीभाषांमध्ये ! हा एक अत्यंत वेगळा प्रकार, प्रयोग वाचला. ज्यांना यात रुची आहे अशा सर्वांना मी हे सर्व, जमा करून अग्रेषित करीत आहे. ही सर्व प्रतिभा त्या त्या कवींची आहे. मराठी भाषेबद्दल आदर वाढविणाऱ्या या प्रयोगाबद्दल सर्वांचे आभार—- 

—–मकरंद करंदीकर

विंदा करंदीकर यांची मूळ कविता (जी मुळात लईभारी हे 🙂 ). मराठीच्या बहिणी असलेल्या अनेकानेक भाषांमधे. 

विठ्ठल (मूळ कविता)

पंढरपूरच्या वेशीपाशी

आहे एक छोटी शाळा

सर्व मुले आहेत गोरी

एक मुलगा कुट्ट काळा ॥

दंगा करतो मस्ती करतो

खोड्या करण्यात आहे

अट्टल

मास्तर म्हणतात करणार काय?

न जाणो असेल विठ्ठल ॥

 ©️ विंदा करंदीकर

============

 इट्टल – (नगरी बोली)

पंडरपुरच्या येसिपासी

हाये येक छुटी साळा

सर्वी पोरं हायेत गुरी

योक मुल्गा कुट्ट काळा

दंगा कर्तो मस्ती कर्तो

खोड्या कर्ण्यात बी आट्टल !

मास्तर म्हंती करनार काय ?

न जानू ह्यो आसन इट्टल !!! 

काकासाहेब वाळुंजकर

     – अहमदनगर

==============

इट्टल – (मराठवाडी बोली)

पंडरपूरच्या येशीपशी

हाय बारकी साळा एक

सगळी पोरं हायत गोरी

कुट्ट काळं त्येच्यात एक

आगावपणा करतंय पोराटगी करतंय

आवचिंदपणाबी करण्यात हाय 

आट्टल…

गुरजी मनत्यात करावं काय?

एकांद्या टायमाला आसंलबी इट्टल!

डॉ.बालाजी मदन इंगळे

        – उमरगा

===============

इठ्ठल – (लेवा गणबोली)

पंढरीच्या येशीपाशी

आहे एक छोटुशी शाया

सर्वे पोऱ्हय गोरे

एक पोऱ्या कुट्ट काया 

दंगा करतो मस्ती करतो

खोड्या कऱ्यात आहे अट्टल

मास्तर म्हने करे काय

न जानो अशीन इठ्ठल

प्रशांत धांडे

   – फैजपूर

=======

ईठ्ठल  – (अहिराणी रुपांतर)

पंढरपूरना शीवजोगे

एक शे धाकली शाया;

सम्दा पोरे शेतस गोरा

एक पोर्‍या किट्ट काया ||

दांगडो करस, मस्त्या करस

खोड्या कराम्हा शे अट्टल;

मास्तर म्हने काय करो ?

ना जानो हुई ईठ्ठल  ||

नितीन खंडाळे 

   – चाळीसगाव

==========

इठ्ठल – (तावडी अनुवाद)

 पंढरपूरच्या येसजोय

आहे एक छोटी शाया

 सम्दे पोरं आहेती गोरे

  एक पो-या कुट्ट काया ll

 दंगा करतो मस्ती करतो

 खोड्या क-यामधी आहे अट्टल

 मास्तर म्हनता करनार काय?

ना जानो असीन इठ्ठल  ll

प्रा.डॉ.प्रकाश सपकाळे

     – जळगाव

==============

प्रस्तुति – श्रीमती उज्ज्वला केळकर

176/2 ‘गायत्री’, प्लॉट नं 12, वसंत साखर कामगार भवन जवळ, सांगली 416416 मो.-  9403310170

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ भारताचा नदीजोड प्रकल्प – भाग – 1 ☆ सौ. पुष्पा नंदकुमार प्रभुदेसाई

सौ. पुष्पा नंदकुमार प्रभुदेसाई

☆ मराठी साहित्य – विविधा ☆ भारताचा नदीजोड प्रकल्प – भाग – 1 ☆ सौ. पुष्पा नंदकुमार प्रभुदेसाई ☆

(लोकनेते राजारामबापू जन्मशताब्दी निमित्त मराठी वि न परिषद इस्लामपूर यांच्यातर्फे घेतलेल्या निबंध स्पर्धेतील प्रथम पुरस्कार मिळालेला लेख.)

  गंगेच यमुनेचैव गोदावरी सरस्वती ।

नर्मदे,सिंधू, कावेरी जलेस्मीन संनिधिं कुरू।।

दररोज देवाची पूजा करीत असताना देवाजवळच्या तीर्थाच्या कलशात आपण सर्व नद्यांना आवाहन करतो. त्यांना त्या कलशामध्ये पाहतो. यावरूनच समजत, नद्यांना महत्व किती आहे ते. देशातील लहानमोठी प्रत्येक नदी आपली जीवनदायिनी आहे. आपल्या संस्कृतीमध्ये नद्यांनाही देवत्व दिलं आहे. त्यांना आपण माता, मैय्या, माई असंही म्हणतो. गंगा ही तर सर्वश्रेष्ठ अध्यात्मिक, पौराणिक, भावनिकदृष्ट्या ही तिचं महत्त्व खूप आहे, की माणसाला शेवटच्या क्षणी गंगाजल तोंडात घालतात. पवित्र जल देशाच्या दक्षिणेपर्यंत पोचल तर,  त्या तिर्था साठी, काशी हरिद्वारला जाण्याची गरज नाही. आज तंत्रज्ञानाच्या युगात तेही शक्य आहे. आणि त्यासाठी उपाय “नदी जोड प्रकल्प.”

भौगोलिकदृष्ट्या भारत हा एक खंडप्राय देश आहे. येथील भिन्नभिन्न ठिकाणी हवा, पाणी, लोकसंख्या, चालीरीती वेगवेगळ्या आहेत. देशाचा 35 टक्के भाग दुष्काळी, 33 टक्के भाग गंभीर दुष्काळ प्रवण आणि उत्तरेकडील भाग संपन्न असल्याचे दिसून येते. एकूणच विकासाचा सारासार विचार करता हे सगळं ‘पाणी’ या एका निकषावर अवलंबून आहे. व्यावहारिकदृष्ट्या देशातील जास्तीत जास्त भाग समपातळीवर, समान विकास यावा यासाठी सर्वोत्तम उपाय “नदी जोड प्रकल्प.”

भारताच्या लोकसंख्येत दर वर्षी 15 दशलक्ष संख्येने वाढ होते. अन्नधान्याची मागणी वाढते. पाण्याचे दुर्भिक्ष वाढते. भूजल पातळी खाली जाते. ऊर्जेची मागणी वाढते. दक्षिणेकडील राज्यात बऱ्याच भागात लहरी पावसामुळे पिके अपयशी होतात. कर्जबाजारी शेतकरी आत्महत्या करतात. त्यासाठी जलसंपत्ती व्यवस्थापन व ‘नदीजोड’ हा आश्वासक आणि खात्रीचा उपाय आहे .आणि ती या काळाची गरज आहे.

ऐतिहासिक विचार करता, एकोणिसाव्या शतकात इंग्रज इंजिनियर ऑर्थर कॉटन यांनी दक्षिण पूर्व भागातील दुष्काळ कमी व्हावा व तिकडून आयात निर्यात करण्याच्या उद्देशाने नदीजोड प्रकल्पाचा प्रस्ताव मांडला होता. 1970च्या दशकात के एल राव यांनी “राष्ट्रीय जलग्रीड” प्रस्ताव मांडला. २०13 पर्यंत अनेक प्रस्ताव होऊनही सर्व थंडच राहिले. 1999 नंतर सुरेश प्रभुंनी त्याचा अभ्यास केला. आणि’ ‘नदी जोड’ विचारांचे पुनर्जीवन झाले.

“नदीजोड प्रकल्प” हा नागरी अभियांत्रिकी प्रकल्प आहे. पूरप्रवण क्षेत्रातील जास्तीचे पाणी जलाशयात साठवून, ते दुष्काळी भागातील नद्यांतून सोडावे हा या प्रकल्पाचा मूळ हेतू आहे. देशातील 37 नद्या या ठिकाणी जोडणे, 3000 जलाशय आणि चौदाशे 90 किलोमीटर लांबीचे कालवे काढावे लागतील. त्यामुळे प्रचंड प्रमाणावरील जमीन ओलिताखाली येईल. मोठ्या प्रमाणावर (४०००मे.वँ.) इतकी वीज निर्मिती होईल. उत्तरेकडील पुराचे दुष्परिणाम सोडवून, दक्षिणेकडील पाणीटंचाई दूर होऊन, हरितक्रांती होईल. वनीकरण वाढेल. पर्यावरण संतुलन होईल. रोजगार वाढेल. स्वस्त असणारी जलवाहतूक वाढेल. सर्वत्र सुजलाम-सुफलाम होईल.                    

नदीजोड प्रकल्पचा विचार करता, त्याचे तीन भाग केले आहेत.

१) उत्तर हिमालयीन चौदा नद्यांचा जोड.

२) दक्षिण द्वीपकल्प नद्यांचा जोड.

३) इंट्रा-स्टेट सदतीस नद्यांचा जोड.

अशा आराखड्याचे व्यवस्थापन जलसंपदा मंत्रालया अंतर्गत राष्ट्रीय जलविकास (N. W. D. A.). संस्थेद्वारे केले जात आहे.

क्रमशः …….

©  सौ. पुष्पा नंदकुमार प्रभुदेसाई

बुधगावकर मळा रस्ता.

मिरज.

मो. ९४०३५७०९८७

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ स्वातंत्र्यदिन… ☆ प्रा. सौ. सुमती पवार

प्रा. सौ. सुमती पवार

? विविधा ?

☆ स्वातंत्र्यदिन… ☆ प्रा. सौ. सुमती पवार ☆

स्वातंत्र्य दोन प्रकारचे असते . १) शारिरीक २) मानसिक.

आपला देश स्वतंत्र झाला. इंग्रजांच्या मगरमिठीतून मायभू, आपली माती मुक्त झाली. १५० वर्षे आपण त्यांचे गुलाम होतो.

त्यांच्या तालावर नाचत होतो.. नाचणे भाग होते, त्याला पर्याय नव्हता. ते आपले मालक व आपण त्यांचे गुलाम होतो. त्यांची प्रत्येक आज्ञा आपल्याला इच्छा असो वा नसो पाळावी लागत होती. इतक्या वर्षात ते सारे आपल्या अंगवळणी पडले होते.

सवईचे झाले होते, आपल्या नसानसात , मनात मुरले होते.

ते देश सोडून.. ही भूमी सोडून गेले .. पण त्यांच्या काळात जी मनोभूमी, आमची तयार झाली होती .. तिचे काय..? ती इतक्या सहजा सहजी जाणार होती काय ..? नाही. ही मानसिक गुलामगिरी.. सवयी इतक्या सहजासहजी जात नसतात. ते गेल्या नंतर त्यांनी जी व्यवस्था किंवा घडी बसवली होती तिच चांगली होती.. त्यांचे राज्य चांगले होते असे म्हणणारे लोक खूप होते. कारण स्वातंत्र्य मिळाल्या नंतर जादूची कांडी फिरावी तशी लगेच सुव्यवस्था निर्माण होईल अशी लोकांची अपेक्षा होती .. ते एवढ्या मोठ्या देशात लगेच कसे शक्य होते? दारिद्र्य, अज्ञान, जुन्या रूढी परंपरा हे आमचे मोठे शत्रू होते, अजूनही आहेत .. ते लगेच जाणे शक्य नव्हते.

शिवाय त्यांनी मुरवलेले मानसिक अंपगत्व होतेच .म्हणजे बघा .. भूमी स्वतंत्र झाली होती. पण आमची मानसिक गुलामगिरी तशीच होती नि आहे. देशाने आम्हाला आचार, विचार, लेखन स्वातंत्र्य दिले आहे तरी आम्ही त्या मानसिक अवस्थेतून पूर्ण बाहेर पडलो आहोत का? आमची अवस्था आजही “.. ना .. घरका ना.. घाटका “अशी आहे. एकच उदा. इंग्रजी भाषा. इंग्रजी काय किंवा इतर कोणत्याही भाषा… जास्त भाषा बोलता आल्या तर उत्तमच. पण आपली मातृभाषा हीच सर्वश्रेष्ठ भाषा असते ह्या विषयी कुणाचे ही दुमत असू नये.इंग्रजी एक भाषा म्हणून शिकायला हवीच पण .. इतर देश पहा .. आपलीच मातृभाषा वापरतात.

आपल्याला मात्र इतक्या वर्षांनंतरही नक्की काय करावे सुचत नाही .. टिळक, गांधी काय इंग्रजी माध्यामात शिकले होते? हेच ते मानसिक अंपगत्व आहे. त्यांचे सूट, बूट, टाय..

अहो, अतिशय थंड प्रदेशातून ते आले होते. आम्ही भर उन्हाळ्यात लग्नकार्यात सूट घालून घामाघूम होत मिरवतो हेच ते मानसिक अपंगत्व .. आजकाल आम्हाला जमिनीवर बसताच येत नाही .. सवयी घेतल्या .. गुलाम झालो. म्हणून स्वातंत्र्य मिळाले तरी आम्ही अजून स्वतंत्र झालो आहोत का?

ह्याचा प्रत्येक भारतीयाने विचार करणे गरजेचे आहे.

या विषयावर खूप काही बोलता व लिहिता येईल पण तरी माझ्या मतांशी सहमत व्हावेच याची गरज नाही.कदाचित माझे लिखाण विषयाला सोडून झाले असे वाटल्यास ते मुक्त चिंतन समजावे ही विनंती …

© प्रा.सौ.सुमती पवार ,नाशिक

(९७६३६०५६४२)

svpawar6249@gmail.com

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ देव साक्षीला होता – भाग-२ ☆ श्री अरविंद लिमये

श्री अरविंद लिमये

?जीवनरंग ?

☆ देव साक्षीला होता – भाग-१ ☆ श्री अरविंद लिमये ☆

(पूर्वसूत्र- बबन्याच्या डोळ्यांपुढे ऑपरेशनचे पैसे अंधारातल्या काजव्यांसारखे चमचमत होते. त्या पैशातून औषधपाणी करून जनीला माणसात आणायची आणि निदान दहा-पंधरा दिवस पुरेल एवढा बाजार झोपडीत भरायचा एवढंच स्वप्न उरात दडवून, आदल्या रात्रीच्या उपाशी पोटाने बबन्या सकाळीच रस्त्याला लागला होता. त्याच्या डोळ्यांत स्वप्नं भिरभिरत होती, पण घडणार होतं विपरीतच…!)

मान टाकल्यासारखा दिवस उजाडला, तसाच मावळूही लागला. रोजच्यासारखी दुपार तापलीच नाही. राख धरलेल्या निखाऱ्यासारखा सूर्य दिवसभर थंड आभाळांत पडून राहिला होता.तो विझून जावू लागला,  तसं आभाळ विव्हळू लागलं. सांज झाली, आणि आसूड ओढल्यासारख्या विजा कडाडू लागल्या. संकटाची दवंडी पिटत वारा घोंगावू लागला. स्वतःचा जीव वाचवीत धुळीचे लोट पळू लागले.

मातीत खेळणाऱ्या पोरांच्या दंडांना धरुन पळवत बायाबापड्यांनी घरं गाठली.

घरासमोरची आवराआवर करून दार पटाटा लावली.अंगात संचार व्हावा तशी झाडं घुमू लागली.

वानरांनी जीव मुठीत धरून फांद्यांना मिठ्या मारल्या. पक्षांचे पुंजके घरट्यात लपले. पानांबरोबर ती जड घरटीही झुलू लागली. ऐन मुहूर्ताला आभाळ उरी फुटून रडू लागलं.त्याच्या अश्रूंचा महापूर आल्यासारखं पाणी कोसळू लागलं. अख्खं गाव पाण्यानं चिंब झालं. महार वाड्यात पेटू लागलेली चुलाणी पेटण्यापूर्वीच विझू लागली. पावसाच्या सड्यानं सादळून गेली. पावसानं जोर आणखी वाढवला तशी जनी धास्तावली.

फडक्यात बांधून ठेवलेलं दोन भाकरींचं पीठ झाडून घेऊन त्या वेळी ती भाकरी थापत होती. भुकेने कासावीस होऊन शिन्यानं भोकाड पसरलं. त्याच्या पाठीत धपाटा घालायला उठण्यासाठी दात ओठ खात जनीनं जमिनीला रेटा दिला, तेव्हा मांडीवर झोपलेल्या झीप्रीची झोप उडून ती रडायला लागली. झपाटून पटापटा मुके घ्यावेत तसं काकणं वर सारून जनीनं झीप्रीच्या इवल्याशा पाठीत धपाटे हाणले, आणि तिला जमिनीवर भिरकावलं. शेकून झालेल्या धुरकट भाकरीचे दोन तुकडे थाळीत टाकून तिने थाळी शिन्यासमोर सरकवली. आणि हात लांब करून झीप्रीला पुन्हा कवटाळून घेतलं. झीप्रीचा घाबरलेला जीव पाणी शिंपडल्यासारखा शांत झाला.

जनीच्या पुढे आता फक्त कसंबसं एकाच भाकरीचं पीठ शिल्लक होतं. तिने भाकरी थापली. शेकली. भाकरीचा तो चंद्र दुरडीत अलगत उभा ठेवला.तिच्या दिवसभराच्या भुकेल्या पोटात त्याच्या खरपूस वासानं आगडोंब उसळला.तिने आवंढा गिळला. आणि ती चुलाणं विझवायला लागली.

‘आता बबन्या आला की आर्धी आर्धी भाकर दोघांनी संगट खायची ‘असा विचार तिच्या मनात आला, तेवढ्यात झोपडीबाहेर कुणाचीतरी पावलं वाजली.

‘बबन्याचअसनार …’ जनी हरकली. झिपरीला सावरत ती दाराशी आली. समोर सादळलेला मिट्ट काळोख होता. त्यात बबन्या दिसेचना. तिने डोळे फाडून पाहिले तेव्हा खूप वेळाने तिला त्या अंधारात अंधुक दिसू लागलं. …समोर बबन्या नव्हताच. शिरपा न् सदा उभे होते. आख्खे भिजलेले. गुडघ्यापर्यंत चिखल माखलेले…

“ह्ये न्हाईत. ह्यो पाऊस मुडदा कोसळतुय न्हवं का कवा ठावनं. कुटं आडकून पडल्यात द्येवालाच ठाव..”

शिरपा न् सदाला काय बोलावं सुचेचना. देवाच्या साक्षीनं घडून गेलेलं आक्रित आठवून शिरपा न् सदा अजूनही कासावीस होते. धीर गोळा करून मग शिरपाच बोलू लागला आणि व्हय व्हय करत सदा भेदरल्या अवस्थेत मान डोलवत राहिला. सगळं ऐकून जनी शक्तीच गेल्यासारखी मटकन् खालीच बसली. मनातल्या धुवांधार पावसानं तिचे डोळे चिंब भिजून वाहू लागले. पण आरडून ओरडून रडायचं भान न् त्राण तिच्या भुकेल्या शरीरात नव्हतंच. भाकरीचा तो चंद्रही आता वास हरवलेल्या अवस्थेत विझलेल्या चुलीपुढं दुरडीत मान टाकलेल्या बेवारशासारखा थंड पडला होता..! सकाळी जाताना मागं वळून हात हलवणारा बबन्या तिच्या ओल्या नजरेसमोर तरळत राहिला आणि बबन्यासाठी काकुळतीला आलेल्या जनीचं मन वेडंपीसं झालं. मघाशी भोकाड पसरून रडणाऱ्या त्या आभाळासारखं ते खदखदू लागलं. झिप्रीला तिथंच जमिनीवर टाकून देहभान विसरल्याअवस्थेत ती चिखलपाण्यातून धावत सुटली ..वेशीच्या दिशेने..!       

वेशीसमोर देवाच्याच साक्षीने आक्रित घडून गेलं होतं!!                                             

सांज झाली, तेव्हा आत्ता बबन्या येईल म्हणून जनी सादळलेल्या चुलीत जाळ लावून भाकरी थापत होती तेव्हा तिकडे पावसात अडकलेला बबन्या वेशीवरच्या झाडाखाली उभा होता. शिरपा आणि सदा त्याच्या बरोबरच होते. पावसाचा जोर वाढला आणि झाडाखालीही पाणी ठिबकायला लागलं तसं शिरपा न् सदानं शाळेच्या आडोशाला धाव घेतली. शाळेच्या आवारात पोचल्यानंतर त्यांच्या लक्षात आलं की बबन्या त्यांच्याबरोबर आलेलाच नाहीय. तो झाडाखालीही दिसेना. नजर लांब करून पहायचा प्रयत्न केला तेव्हा त्यांना जाणवलं की वेशीवरच्या मारुतीच्या देवळात कसलीतरी झुंबड उडालीय. ऑपरेशन करून आलेल्या बबन्याला त्यांच्यामागे शाळेपर्यंत इतक्या लांब पळता येईना तेव्हा त्याने जवळच असलेल्या मारुतीच्या देवळाकडे धाव घेतली होती. पाऊस चुकवायला म्हणून देवळाच्या पायरीवरून तो थोडा वर सरकला आणि..आणि तिथं पावसामुळे आधीच देवळात आश्रयाला थांबलेले गावकरी भडकले. ‘हे म्हारडं देवळात आलंच कसं..’ म्हणून ओरडू लागले. आदल्या रात्रीपासून उपाशी असलेला आणि ऑपरेशनच्या वेदनांनी कळवळणारा बबन्या हात जोडून गयावया करीत होता.

“पान्यात भिजाय लावू नगा..’ म्हणत त्यांचे पाय धरायला तो पुढे झाला तसा गावकऱ्यांच्या गर्दीतला एक जण पुढे झेपावला. 

“या म्हारड्यानं द्येव बाटिवला” म्हणत त्याला लाथाबुक्क्यांनी तुडवायला लागला. ते पाहून बाकीच्यांचीही भीड चेपली. तेही एकामागोमाग एक करीत पुढे आले. बबन्याला धक्के देत त्यानी भर पावसात त्याला देवळापुढच्या चिखलात ढकलला. कुणीतरी जवळचा एक दगड उचलला आणि नवीन दिशा मिळाल्यासारखे एकेक करत सगळेच खाली वाकले. बबन्यावर दगडं बरसायला लागली. हातातल्या काठ्यांचे वार सुरू झाले. बबन्या गुरासारखा ओरडत होता. हातापाय आवळत मार चुकवायचा व्यर्थ प्रयत्न करीत होता. रक्ताळलेल्या बबन्याचे मासांचे लगदे लोंबू लागले तसे गावकरी दमून थांबले. मोठ्ठं यज्ञकर्म पार पडल्याच्या समाधानात पांगून गेले. मग पाऊसही थकून थांबला. शाळेच्या  छपराखालून शिरपा न्  सदा वेशीपर्यंत आले तोवर रक्ताळलेला बबन्या मारुती समोर चिखला सारखाच थंड पडला होता..!

…..जनी धावत धापा टाकत वेशीपर्यंत आली तोवर तिथे बबन्याजवळ चिटपाखरूही नव्हतं.वेशीवरच्या देवळात नाही म्हणायला मारुती मात्र उभा होता…! 

जनी बबन्याला आणि त्या देवालाही जाग यावी म्हणूनच जणू  धाय मोकलून आक्रोश करीत राहिली…!!

समाप्त

©️ अरविंद लिमये

सांगली (९८२३७३८२८८)

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ एक अनोखी अनुभूती! ☆ श्री विजय गावडे

श्री विजय गावडे

? मनमंजुषेतून ? 

☆ एक अनोखी अनुभूती! ☆ श्री विजय गावडे ☆  

जुन्या घरातून नवीन घरात शिफ्ट करतांना काय नेऊ, काय नको या द्विधा मनस्तितीतून जात होतो. देव्हारा हालवताना मन गलबललं.  देव्हाऱ्यातील सगळे देव एका जागी डब्यात ठेवून, खाली देव्हाराही हलवला.

दोघांचेही बाबा फोटोतून आमच्या हालचालीवर नजर ठेवून होते. तिचे बाबा, माझे बाबा. दोघेही जिगरी दोस्त.“ ते फोटो गावी नेऊ. राहू  देत तो पर्यन्त इथे.”  ही म्हणाली. मीही आग्रह नाही केला.

सामान सुमान आता व्यवस्थित लावून झालंय. देव्हारा पण छान सजलाय. लहानसा लामणी दिवा लटकताना खूपच शोभून दिसतोय. हा दिवा आणि विठ्ठल रखुमाईची ‘कटेवरी कर’ वाली मूर्ती पंढरपूरी खरेदी केलेली. सासरेबुवा महिंद्रातून रिटायर झाल्यावर आम्हा सर्वांना पंढरपूर यात्रा घडवली होती त्यांनी. स्वखर्चाने.

“अरे! विठोबा रखुमाई कुठाय? देव्हारी तर नाहीये. गेली कुठे. घेताना तर सर्व सान थोर देवताना एकत्र घेतलेलं. गेली कुठे?”——अचानक हिच्या गालावरून अश्रू ओघळले. जोरजोरात हुंदके देत हिला रडताना पाहून मीही हादरलो. रडू आवरून तिला बोलतं केलं—. “ आपल्या दोघांच्या वडिलांना मागे ठेऊन आलो आपण. त्याचीच ही परिणती. विठोबा रखुमाई दोघही रुसलीत आपल्यावर.”

——लागलीच जुन्या घरी जाऊन दोघांही बाबांना सम्मानपूर्वक नवीन घरी आणलं!

पुनः शोध. विठूरखुमाईचा. रखमाय रुसलेली ऐकलेलं. इथे तर दोघेही आमच्या दोघांवर रुसलेली. सहन होत नव्हतं. अस्वस्थता वाढत होती, आणि आज शेवटी त्या कटेवरी कर घेतलेल्या दोघांच दर्शन झालं एकदाचं. गणेशाच्या विश्वास बसणार नाही एवढ्या लहान तस्विरीच्या मागे लपले होते विठुराया, सहकुटुंब! आमच्या कन्या रत्नाचं आगमन होण्यासाठी थांबले होते जणू, प्रगट व्हायचे!

की दोघांच्याही जन्मदात्यांना मागे ठेऊन आल्यामुळे रुसलेले जगत्पिता!—-तो विठुरायच जाणो. 

पंढरीनाथ महाराज की जय

© श्री विजय गावडे

कांदिवली, मुंबई 

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ नागपंचमी : मूळ संदर्भ ☆ संग्राहक – सौ.स्वाती घैसास

? इंद्रधनुष्य ? 

☆ नागपंचमी : मूळ संदर्भ ☆ संग्राहक – सौ.स्वाती घैसास ☆ 

नागपंचमीचा संबंध “नाग” या सरपटणा-या सापासी(सर्प)असंख्य वर्षांपासून लावेल गेलेला आहे. परंतू या सणाला याहून वेगळे आणि वैशिष्टयपूर्ण असे संदर्भही आहेत—–

भारतात नाग हे “टोटेम” असणारे पाच पराक्रमी नाग-राजे होऊन गेले •••

१• अनंत (शेष) नाग

२• नागराजा वासुकी

३• नागराजा तक्षक

४• नागराजा कर्कोटक

५• नागराजा ऐरावत

नागपंचमी ह्या पाच नागराजांशी संबधित आहे. ह्या पाचही नाग-राजांची स्वतंत्र गणतांत्रिक (republican) स्वरुपाची राज्ये होती.  यामध्ये नागराजा अनंत हा सर्वात मोठा. जम्मू-काश्मीर मधील अनंतनाग हे शहर त्यांच्या स्मृतीची साक्ष पटवून देते. 

त्यानंतर दुसरा नागराजा म्हणजे वासुकी नागराजा.  हा कैलास मानसरोवरापासून उत्तर प्रदेश क्षेत्राचा प्रमुख होता.

तिसरा नागराजा तक्षक यानेच जगप्रसिद्ध तक्षशिला विश्वविद्यापीठ स्थापन केले. येथेच प्लेटो, अँरीस्टॉटल सारखे तत्वज्ञ शिकून गेलेत.

चवथा नागराजा कर्कोटकाचे रावी नदीच्या शेजारील प्रदेशात राज्य होते. 

पाचवा नागराजा ऐरावत (पिंगाला) याचा भंडारा प्रांत, जो आजही पिन्गालाई एरीया म्हणून ओळखला जातो.

ह्या पाचही नागराजांच्या गणराज्याच्या सीमा एकमेकांच्या राज्याला लागून होत्या. हे पाचही  नागराजे मृत्यू पावल्यानंतर, त्यांच्या स्मृतिप्रित्यर्थ नागवंशीय लोक “नागराजे स्मृति अभिवादन” —“नागपंचमी” म्हणून दरवर्षी साजरा करीत असत.

कालांतराने या राजांच्या “ स्मृती-पूजना”ला जाणते-अजाणतेपणाने वेगळेच वळण लागले आणि आत्तासारखी नागपंचमी रूढ मानण्यात येऊ लागली. आर्थिक परिस्थितीमुळे गरीब बहुजन वर्ग  कागदी नाग नरसोबा ट्रेंडकडे आकर्षित झाला, कारण त्यांच्या पूजेतून पुण्य मिळते हे बहुजनांच्या मनमेंदूमध्ये बिंबवले गेले.  त्याचाच परिणाम म्हणून ‘नाग नरसोबा’ आणि काही पोथ्या प्रसिद्ध झाल्या आणि अशी ही आता साजरी केली जाणारी नागपंचमी रूढ झाली आणि “ नागलोकांची पंचमी “ लुप्त झाली. आज नागाला दूध पाजणे, त्याची पूजा करणे एवढाच नागपंचमीचा अर्थ उरला आहे.  तरीपण बहुजन समाज आजही घराच्या भिंतीवर पाच नाग काढणे विसरलेला नाही. हे पाच नाग म्हणजेच आपले पाच नागराजे होत.

आज जरी नागपंचमी ही सरपटणाऱ्या नागाची म्हणून प्रसिध्द असली तरी त्याबाबतची ऐतिहासिक वस्तूस्थिती वेगळीच आढळते. म्हणूनच बहुजनांनी धार्मिक परिघाच्या बाहेर येऊन, नागपंचमी अशी सणाच्या स्वरूपात साजरी करण्याबरोबरच,  “बहुजन नागराजे” यांच्या स्मृतीलाही आवर्जून  अभिवादन करावे.

 

संग्राहक – स्वाती घैसास

९८२२८४६७६२.

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ स्वातंत्र्य संग्रामात भारतीय स्त्रियांचे योगदान – भाग दुसरा ☆ सौ. दीपा नारायण पुजारी

सौ. दीपा नारायण पुजारी

? विविधा ?

☆ स्वातंत्र्य संग्रामात भारतीय स्त्रियांचे योगदान – भाग दुसरा ☆ सौ. दीपा नारायण पुजारी 

आपण प्रत्यक्ष लढाईत, सशस्त्र चळवळीत महिलांनी घेतलेला सहभाग बघितला. अहिंसक चळवळीतही हजारो स्त्रियांचा सक्रिय सहभाग होता. सशस्त्र क्रांतिकारक गटामध्ये प्रचारपत्रके वाटणे, भूमिगतांना खाणे पुरवणे अशी कामे त्या करीत. यात बंगाली मुलींच्या साहसकथा रोमाहर्षक आहेत.

‘शांती घोष ‘ आणि ‘सुनीती चौधरी ‘ या दोन तरुण मुलींनी टीपर जिल्हा मॅजिस्ट्रेट स्टिफन्स याची गोळ्या झाडून हत्या केली. हा बंगाली मुलींवर अत्याचार करत होता..

६ फेब्रुवारी १९३२ . . कलकत्ता विद्यापीठात दिक्षान्त समारंभात भाषण करणाऱ्या सर स्टॅनली जॅक्सन यांच्यावर ‘बीना दास’ हिने गोळी झाडली. हे पिस्तुल ‘कल्पना दास’ हिने अन्य मुलींच्या कडून पैसे गोळा करून खरेदी केलं होतं.

‘कल्पना दास ‘आणि ‘प्रीतीलता वाडेदार’ बालपणीच्या मैत्रिणी. ‘ ईश्वर आणि राष्ट्र’ यांच्याशी एकनिष्ठ राहण्याचं व्रत त्यांनी घेतलं होतं. २४ सप्टेंबर १९३२ ‘प्रीतीने’ पहाडताली क्लबवर हल्ला केला.इंग्रजांच्या हाती लागू नये म्हणून सायनाईड प्राशन केले. प्रीतीलता गेली, परंतु स्रियांची ताकद लोकांना समजली.स्री बदलत गेली. स्वतः तून बाहेर पडली. प्रगतीच्या पथावर पुढे जात राहिली.

महाराष्ट्र ही मागे नव्हता.नरगुंद नावाच्या एका छोट्या संस्थानातील राण्यांनीही ब्रिटिशांच्या विरोधात शस्त्र उचलले व त्या शहीद झाल्या.इ. स. १८८५ मध्ये कॉंग्रेस ची स्थापना झाली. त्यानंतर काही वर्षांनी महिला कॉंग्रेसच्या अधिवेशनाला जाऊ लागल्या. ‘श्रीमती कादंबिनी गांगुली’ हिने प्रथम व्यासपीठावर जाऊन बोलण्याचे धाडस केले. ” महिला म्हणजे कचकड्याच्या बाहुल्या नाहीत. आम्ही पुतळे बनून राहणार नाही” या बोलामुळे स्रियांची अबोल भावना बोलकी झाली. हळूहळू त्या कॉंग्रेसच्या अधिवेशनात आपले विचार मांडू लागल्या.

महाराष्ट्रातील नाशिक शहरात स्वदेशीची शिकवण देणारी एक महिला सभा होती. स्वातंत्र्य वीर सावरकर यांच्या वहिनी ‘येसूवहिनी’ सभेच्या संस्थापिका होत्या. सावरकर बंधू अंदमानच्या काळकोठडीत शिक्षा भोगत होते. अभिनव भारत या संघटनेतील बहुतेक कार्यकर्ते तुरुंगात होते. त्यांच्या बायकांना बंडखोरांच्या बायका म्हणून पोलिस त्रास देत. सासरची व माहेरची माणसं ही त्यांना सरकारी भयामुळं जवळ करीत नव्हती. ‘येसू वहिनींनी’ ‘आत्मनिष्ठ युवती संघ’ नावाची संघटना स्थापन केली. या स्रियांनी स्वदेशी चे व्रत घेतले आणि त्याचा प्रसार केला. त्याच काळात

काळाच्याही पुढे जाऊन त्यांनी हातात काचेच्या बांगड्या घालण्याचे सोडले! साखर परदेशी म्हणून ती ही सोडली. ‘कवी विनायक’ यांच्या देशभक्तीपर कवितांवर सरकारने बंदी घातली होती. त्यांचा तोंडी प्रसार केला. ‘यमुनाबाई सावरकर’ ऊर्फ ‘माई सावरकर,’ वि. दा. सावरकर यांच्या पत्नी, या देखील आपल्या घरातील वातावरणाला

साजेशा काम करीत होत्या. त्या रत्नागिरी येथे सावरकरांच्या समाज सुधारक कार्यक्रमात सहभागी होत. महिलांना प्रोत्साहन देण्यासाठी हळदीकुंकू सारखे कार्यक्रम आयोजित करत. स्पृश्य अस्पृश्य भेद मानीत नसत.

विसाव्या शतकात पहिली जगप्रसिद्ध स्वातंत्र्य सैनिक ‘भिकाईजी रुस्तुम कामा.’ मादाम कामांनी झोपडपट्टी पासून समाजसेवेला सुरुवात केली. त्यासाठी त्यांनी घर सोडले. फ्रान्स मध्ये राहून भारतीय क्रांतिकारकांना मदत करण्याचे काम त्यांनी केले.

‘कुमारी बलियाम्माने’ दक्षिण आफ्रिकेतील गांधीजींनी सुरू केलेल्या सत्याग्रहात भाग घेण्यासाठी स्त्रियांचे पथक तयार केले.लाहोरच्या ‘राणी झुत्शीने’ दारुच्या दुकानांवर निदर्शने केली. परदेशी कपड्यांच्या होळ्या पेटवल्या.

म. गांधींनी भारतीय महिलांना तिच्या शक्तीची जाणीव करून दिली. गांधीजींच्या विचारांनी भारुन ‘अवन्तिकाबाई गोखले’ यांनी चंपारण्यात सत्याग्रह केला. हिंद महिला समाजाची स्थापना करुन महिलांना कॉंग्रेसच्या विधायक कामासाठी संघटित केले. एक जानेवारी एकोणीसशे नऊ रोजी ‘सरलादेवी चौधरी’ यांनी ‘वंदेमातरम’ ची घोषणा करुन नववर्ष साजरे केले. ‘हंसा मेहता’ यांनी सायमन कमिशनला विरोध केला. ‘Poet Nightingale of India’, म्हणजेच ‘सरोजिनी नायडू’ दांडीयात्रेत सहभागी झाल्या. त्या पहिल्या महिला राज्यपाल होत.

सविनय कायदेभंग चळवळीत सहभागी अमलप्रभा दास, कमला नेहरू, विजयाताई पंडीत, सत्यभामाबाई, कुवळेकर, कनकलता

बारुआ, अरुणा असावी, उषा मेहता, पद्मजा नायडू, अशी अगणित नावं!! भारतीय इतिहासाच्या  आभाळातील या स्वयंप्रकाशीत तारका आहेत. आजही त्या आदर्श ठरतात.

या सर्व हसत हसत आत्मसमर्पण करणाऱ्या माऊलींनी एक तेजस्वी पथ आपल्या साठी तयार केला. कवी कुसुमाग्रजांच्या कवितेतील या ओळींनी या तेजस्विनींना आदरांजली द्यावीशी वाटते.

“युगायुगांची प्रकाशगंगा उदे तुझ्या पाऊली

  उदे तुझ्या पाऊली. . . . “

समाप्त 

© सौ. दीपा नारायण पुजारी

इचलकरंजी

9665669148

deepapujari57@gmail.com

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ अभिमान मजला तिरंग्याचा …… ☆ सौ. राधिका भांडारकर

सौ. राधिका भांडारकर

? विविधा ?

☆ अभिमान मजला तिरंग्याचा …… ☆ सौ. राधिका भांडारकर ☆ 

परवा टोकियो आॅलींपीक मधे मैदानावर सुवर्णपदक विजेत्या, पाठीवर अभिमानाने आपला तिरंगा मिरवत आलेल्या  नीरज चोप्राला बघितले आणि ऊर अभिमानाने, आनंदाने भरून आला…

खरं म्हणजे कधीही ऊंचावर, डौलाने फडकणारा भारताचा तिरंगी झेंडा पाहून ज्याचे मन ऊचंबळत नाही तो भारतीयच नाही…

अमेरिकेत असताना, एका इंडीअन स्टोअरवर फडकणारा तिरंगा पाहिल्यावर माझी नात चटकन् म्हणाली आज्जी look at the Indian flag.

त्या क्षणीच्या माझ्या भावना शब्दातीत आहेत. माझ्या अमेरिकन नातीच्या डोळ्यातली चमक पाहून मला जाणवले ते तिच्यातलं टिकून असलेलं भारतियत्व…

अशा आपल्या तिरंगी झेंड्याला निश्चीतच एक अभिमानास्पद इतिहास आहे. त्यांतील तीन रंगांनाही भरीव अर्थ आहे.

आज दिसणारा तिरंगा ध्वज येण्यापूर्वी पाच वेगवेगळ्या पद्धतीचे ध्वज पहायला मिळाले.

१९०६ सालचा पाहिला ध्वज, ज्यात लाल पिवळा हिरवा असे तिरंगी पट्टे होते आणि मधे वंदे मातरम् ही अक्षरे होती. लाल पट्ट्यावर चंद्र, सूर्य आणि हिरव्या पट्ट्यावर कमळे होती.

मादाम कामाने १९३६ साली आणलेल्या ध्वजावर हिरवा पिवळा केशरी असे पट्टे होते केशरी पट्ट्यावर चंद्र, सूर्य तर हिरव्या पट्यावर आठ तारे होते.मधल्या पट्यावर वंदे मातरम् अक्षरे होती.

होमरुल चळवळीच्या वेळी लो.टिळक आणि अॅनी बेझंट यांनी पाच लाल आणि चार हिरवे पट्टे एकामागे एक ठेवले व त्यातआठ कमळांऐवजी सप्तर्षींप्रमाणे सात तारे होते..

आंध्र प्रदेशीय पिंगली व्यंकय्या याने हिंदु आणि मुसलमान या दोन धर्मांचे प्रतीक म्हणून लाल व हिरवा असे दोनच पट्टे ठेवले..मात्र गांधीजींनी पांढर्‍या रंगाचा पट्टा त्यात समाविष्ट केला आणि प्रगती चिन्ह म्हणून चरख्याचे चित्र टाकले…१९३१ साली काँग्रेसने या झेंड्यास मान्यता दिली. मात्र १९४७ साली चरख्याच्या ऐवजी अशोकस्तंभावर असलेले धर्मचक्र आले. केशरी पांढरा हिरवा आणि मधे चोवीस आर्‍यांचं धर्मचक्र असा हा तिरंगी ध्वज १५आॅगस्ट १९४७ साली दिल्ली येथे लाल किल्ल्यावर ,स्वातंत्र्याची ग्वाही देत अभिमानाने फडकला.

पहिला केशरी रंग म्हणजे त्याग, बलीदान समर्पण यांचे प्रतीक.

पांढरा रंग म्हणजे मांगल्य, पावित्र्य, शुचीता शांतीचे प्रतीक.

हिरवा रंग म्हणजे सुजल, सफल समृद्धीचे प्रतीक मधले धर्मचक्र म्हणजे गती, प्रगतीचे चिन्ह..

भारताचा हा तिरंगा म्हणजे भारताची शान अभिमान.

त्याचा वापर कपडे, वेशभूषा, सांप्रदायिक कामासाठी होउ नये. तो सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत फडकावा. पाणी व जमिनीचा स्पर्श त्यास होऊ नये. हा ध्वज खादीचा, सुती अथवा रेशमी असावा.

सरकारी कार्यालये, घर कचेर्‍या यावर आरोहण, त्याचा मान आणि शान सांभाळून करावे. राष्ट्रध्वजापेक्षा ऊंच कुठलीही पताका नसावी. फक्त शहीद हुतात्म्यांच्याच शवाभोवती हा तिरंगा लपेटला जातो व त्यास मानवंदना दिली जाते…एखादी माननीय राजकीय व्यक्तीच्या निधनानंतर शासनाच्या परवानगीनेच तो अर्ध्यावर उतरवला जातो. हे सारे नियम घटनेत नमूद आहेत.

गेली ७४ वर्षे आपण अतिशय अभिमानाने जन गण मन या शब्दबद्ध सुरांच्या लयीत १५आॅगस्ट आणि २६ जानेवारीला ध्वजारोहण करुन, स्वातंत्र्यासाठी प्राणार्पण केलेल्यांना स्मृतीवंदना आदरांजली अर्पण करतो… तेव्हां

झंडा उँचा रहे हमारा।विजयी विश्व तिरंगा प्यारा।।

हे गीत भारतीयांच्या अंत:प्रवाहात उसळत राहते…

आजकाल हा तिरंगा अंतर्देशीय खेळांच्या सामन्यात ,प्रेक्षकांकडून मिरवला जातो. राष्ट्रीय सणांच्या दिवशी त्याची प्रतीके रस्तोरस्ती विकली जातात.देशप्रेमाची एक झलक म्हणून स्तुत्य आहे परंतु नंतर या प्रतीकांचं काय होत.? दुसर्‍या दिवशी कचर्‍यात दिसतात…ही अवहेलना असह्य आहे .यावर शासनाने बंदी आणावी..

आमच्या लहानपणी शाळेत सफेद कपडे घालून भल्या सकाळी उठून ध्वजारोहणासाठी जाण्याची प्रचंड उत्सुकता असायची, त्याचबरोबर एक कर्तव्यबुद्धी असायची. पण आताच्या पीढीतली उदासीनता पाहून मन खंतावते. एका रक्तरंजीत, अभिमानाच्या इतिहासाशी आजचे युवक कसे कनेक्ट होतील हा विचार मनात येतो..

असो, मात्र हा प्यारा तिरंगा असाच विजयाने, शानदारपणे सदैव फडकत राहो आणि भारतीयत्वाची  आन बान शान राखो….!!

© सौ. राधिका भांडारकर

पुणे

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ देव साक्षीला होता – भाग-१ ☆ श्री अरविंद लिमये

श्री अरविंद लिमये

?जीवनरंग ?

☆ देव साक्षीला होता – भाग-१ ☆ श्री अरविंद लिमये ☆

पाखरांची चिवचिव आणि कोंबड्यांचं आरवणं दोन्ही रोजच्या वेळेपेक्षा खूपच लांबलं होतं. अखेर सूर्य उगवला, पण तो कमनुसाच होता.आजारातून  उठल्यासारखा.अशक्त. थंड पडलेला.बबन्या इतका वेळ मेल्यासारखा पडून होता पण मग याची जाणीव होताच कोणाचीतरी झापड बसावी तसा झामदिशी उठला.जनी कुशीवर झोपलेलीच होती.टिचभर लांबीचं महारवाड्यातलं बोळकांडातलं  झोपडीवजा घर त्यांचं.तीन महिन्यांच्या झिप्रीनं रात्रभर तिच्या केकाटण्यानं सगळ्यांनाच जागवलं होतं.त्यामुळे कांबळं सोडताना त्याची पाठ कुरकुरली.

डोळ्यातली ओली झोप लोचट मांजरासारखी ठाण मांडून बसू लागली तशी बबन्या सावध झाला. त्याने अंगभर आळस दिला आणि कुणीतरी खेचावं तसं तो उठला.त्याने चूळ थुंकली. मडक्यातलं लोटीभर पाणी तो गटागटा प्याला.

“जने….जागी हायस न्हवं? जातुय म्या..” झीप्री पाळण्यात चिडीचूप झोपली होती. ती त्याच्या आवाजाने दचकली.दीड वर्षाच्या शिन्या जनीच्या उबेला घट्ट झोपला होता. त्याच्यामुळे जनीला आपली कूसही बदलता येईना.ती अलगद उठून दाराबाहेर आली तोपर्यंत बबन्या दहा हात लांब गेला होता.

“लवकर या परतून.ऊनं उतरायच्या आदी या .लई यळ लाऊ नगासा.भाकरी लावून म्या वाट बगते..”

जनीनं पारोश्या तोंडानेच आवाज दिला. बबन्याने वळून हात हलवला आणि तो झपापा चालत राहिला.बबन्या गेला. पण त्याच्याबरोबर जन्मापासून त्याला सावलीसारखं चिकटून बसलेलं त्याचं ‘वंगाळ’ नशीबही होतंच. त्यानंच सगळं होत्याचं नव्हतं  करून टाकलं.

त्याचीच ही चित्तरकथा.. देवासाठी आणि देवाच्या साक्षीने घडलेली..!!

तालुक्याच्या गावकुसाबाहेरचा हा महारवाडा.गावाने पिढ्यानपिढ्या दहा हात लांब ठेवलेला.पण गाव आता जवळ येऊ लागलं होतं. काम निघेल, असेल तेव्हा का होईना पण अंतर कमी होऊ लागलं होतं. सरपंचाची माणसे, कधीकधी सरपंच स्वतःसुद्धा  या वस्तीत डोकावून जायचा.खोटं का होईना पण मिठ्ठास बोलायचा. नेहमी कसलं कसलं इलेक्शन असायचंच.ते नसेल तेव्हा दुसरी कांहीबाही कामं तरी निघायचीच.

आजसुध्दा एवढ्या सकाळीच चूळ भरून बबन्या रस्त्याला लागला होता ते सरपंचाच्याच सांगण्यावरून. झिप्री झाली तेव्हा हो नाही करता करता जनीने ऑपरेशन करून घेतलं होतं.त्याला आता तीन महिने उलटून गेले.झिप्री तीन महिन्यांची आणि तिच्यावरचा शिन्या दीड वर्षाचा.

बबन्याचा आणि जनीचा संसार शहरातल्या माणसासारखा असा चौकोनी होता. पण हा चौकोन त्यांनी जाणीवपूर्वक आखलेला नव्हता. तीही देवाची करणीच म्हणायची. कारण त्यांची पहिली तीन पिल्लं साथीतल्या उंदरांसारखी पटापटा मेलेली होती.चौथ्या खेपेचा शिन्या होईपर्यंत भरल्या अंगाच्या जनीचा सगळा चोथाच होऊन गेला होता.तरीही शिन्याला पाठीशी बांधून जनी बबन्या बरोबर शेतावर मजुरीला जायची. उन्हांतान्हांत राबायची.एक वेळेला का होईना, दोघाना भाकरतुकडा मिळायचा.

शिन्यासाठी छातीला दोन थेंब दूध तरी यायचं. पण झिप्री झाली आणि  जनीचं कंबरडंच मोडलं.

तिची छाती कोरडी पडली.

दिवसभर आळीपाळीनं तिच्या छातीला झोंबणारी शिन्या आणि झीप्री, तोंड ओलं होईना, तशी पेकाट मोडल्यासारखी केकाटू लागायची.तिकडे सरपंचाला ऑपरेशनची एखादी केस हवी होती आणि इकडे या दोघांना पैसा.तीनशे रुपयांची  हाव धरून उपासमारीची झीट आलेली जनी अखेर ऑपरेशनला तयार झाली.

ऑपरेशन झालं, पण यांच्यापर्यंत येऊन पोहोचले फक्त शंभर रुपयेच!त्या शंभरचंही त्यांना खूप अप्रुप वाटलं होतं. पण ऑपरेशननंतर जनीनं अंथरूण धरलं ते अद्याप पुरतं सुटलं नव्हतं.

पैसे आले आणि गेले.घरात खायप्यायची आबाळ पांचवीला पुजल्यासारखी पुन्हा सुरू झाली. पण आता फाटक्या पदरांत दुधाच्या तोंडाची दोन कच्चीबच्ची होती. त्यांना सोडून आणि मोडकी कंबर घेऊन जनीला शेतावर राबणं झेपेना.अखेर त्यांना देवासारखी सरपंचाची आठवण झाली.बबन्यानं त्याचे पाय धरले. मदतीची याचना केली सरपंचाने,’तू  ऑपरेशन करून घेतोस का’ म्हणून विचारलं. नियमाप्रमाणे म्हटलं तर जनीचं

ऑपरेशन झालेलं असल्यामुळे बबन्याला ऑपरेशनचे पैसे मिळू शकणार नव्हते.पण  सरपंच ‘त्येचं मी बघतो’. म्हणाला.नाव बदलून दाखवायचं ठरलं. डॉक्टर सरपंचाच्या खिशातलाच होता. त्यालाही ऑपरेशनची एखादी केस हवीच होती.

बबन्याच्या डोळ्यांपुढे ऑपरेशनचे पैसे अंधारातल्या काजव्यांसारखे चमचमत होते. त्या पैशातून औषधपाणी करून

जनीला माणसात आणायची आणि निदान दहा-पंधरा दिवस पुरेल एवढा बाजार झोपडीत भरायचा एवढंच स्वप्न उरात दडवून, आदल्या रात्रीच्या उपाशी पोटाने बबन्या सकाळीच रस्त्याला लागला होता.त्याच्या डोळ्यांत स्वप्नं भिरभिरत होती, पण घडणार होतं विपरीतच…!

क्रमशः —————-

©️ अरविंद लिमये

सांगली (९८२३७३८२८८)

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ आमच्या आठवणीतील पहिला स्वातंत्र्यदिन – भाग दुसरा ☆ सुश्री प्रेमा माधव कुलकर्णी

सुश्री प्रेमा माधव कुलकर्णी

? मनमंजुषेतून ? 

☆ आमच्या आठवणीतील पहिला स्वातंत्र्यदिन – भाग दुसरा ☆ सुश्री प्रेमा माधव कुलकर्णी ☆  

आम्ही रहात होतो तेथेही स्वातंत्र्य चळवळीने भारावलेले काही तरुण तरुणी रहात होते. जवळच सेवादलाची शाखा होती. सर्व लहान मुलांना तेथे गोळा करून गाणी गोष्टी सांगितल्या जात. साने गुरुजींची, त्यांच्या विचारांची ही सेवादल शाखा होती. अनेक मैदानी खेळ इथे खेळायला मिळत. झेंडावंदन, देशभक्तीची गाणी शिकवली जात. भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर सेवादलाच्या शाखा हळूहळू बंद पडल्या. पण साने गुरुजींच्या विचाराप्रमाणे, ध्येयाप्रमाणे कार्य मात्र सुरू राहिले.

माझ्या लग्नानंतर एकदा घराच्या माळ्यावर सूतकताईचा चरखा दिसला. मी चौकशी केली तेव्हा समजले, तो माझ्या मिस्टरांचा, ‘माधव नारायण कुलकर्णी’ यांचा होता. ते सेवादलाचे कार्यकर्ते होते. साने गुरुजींच्या विचारांचा त्यांच्यावर प्रभाव होता. त्यांनी कोल्हापुरात राष्ट्रसेवादलाचे शाखा प्रमुख म्हणून उल्लेखनीय काम केले होते. पहिल्या स्वातंत्र्य दिनाची ते एक आठवण सांगत. ध्वजारोहण कसे करावे, वंदेमातरम म्हणायला शिकवणे, तिरंगा हवेत लहरत ठेवण्याचे नियम शिकवणे वगैरे गोष्टींची माहिती लोकांना देण्याकरिता हे सेवादलाचे कार्यकर्ते गावागावातून जात. त्यात श्री. राम मुंगळे, श्री. बाबासाहेब बागवान, श्री.यमकनमर्ढे वगैरे मित्र असत. सेवादलाची गाणीही गायला शिकवले जाई. नंतरही बरीच वर्षे हे सर्व मित्र (‘ह्यांच्या सांगण्याप्रमाणे जवळजवळ पन्नास वर्षे) महिन्यातून एकदा एकत्र येत. स्थळ होतं, श्री. मोहनराव लाटकर यांचे ‘ओपल हॉटेल!’ त्यात श्री. चंद्रकांत पाटगावकर, बाबुराव मुळीक,इ. होते. हे सर्व श्री. एस्. एम्. जोशी, श्री. नानासाहेब गोरे, श्री. यदुनाथ थत्ते, श्री. आजगावकर आणि साधना परिवाराशी जोडलेले होते. देशभक्तीने भारावलेले हे प्रामाणिक कार्यकर्ते! बरेचसे प्रसिध्दी पराङमुख!! बाबुराव यमकनमर्ढे यांनी तर त्या काळात कोकणात जाऊन शाळा सुरु केली.

बालवयात ऐकले होते, स्वातंत्र्य मिळाले, चांगले दिवस येतील. लहानपणी काही दिवस रेशनवर धान्य मिळे. मिलो (तांबडा जोंधळा)मका, बटाट्याचे चौकोनी तुकडे… कापड सुध्दा रेशनवर मिळे. चीटाचे  कापड म्हणत. . याचेच कपडे शिवले जात. फ्रॉक, परकर-पोलकी, गल्लीतल्या सर्व मुलींची सारखी! आम्हाला गंमत वाटे!! गोर गरीब, सामान्य, श्रीमंत, सुस्थितीतील लोकांनाही तेच कपडे घालावे लागत. त्यावेळी साथीचे रोग होते. प्लेग, कॉलरा, टी. बी., देवी, इ. पालक चिंतेत असत. दंगलीही होत. सामाजिक वातावरण काहीसं असुरक्षित वाटे. तरीही शेजारी एकमेकांना मदत करत. लपंडाव, सागरगोटे, आंधळी कोशिंबीर असे अनेक देशी खेळ खेळण्यात मुलांना आनंद मिळे. वर्तमानपत्रे, मासिके, पुस्तके यांच्या वाचनाने विचार आणि जीवन समृद्ध होत असे.

आज विचार केला तर? अन्नधान्याच्या बाबतीत आपण स्वावलंबी झालो आहोत. तरी शेतकरी काळजी मुक्त नाही. कपडे, फळे, धान्य मुबलक आहे. अद्ययावत साधने, विज्ञान-तंत्रज्ञान यामुळे  सुधारणा झालेली आहे. परंतु संकटांचा ससेमिरा तसाच आहे. कोरोनाची महामारी, महापूरासारखी आस्मानी संकटे त्यात भर घालत आहेत. कोविड जीवाणूंचे नवीन प्रकार पाय पसरत आहेत. शासन व्यवस्था करत आहे. पण गरज आहे मनोबलाची, स्वच्छतेची, शिस्तीची! गरज आहे विश्वासाने एकमेकांना समजून देण्याची!! लहानथोरांना आधार देण्याची!! स्वतंत्र भारताची, स्वातंत्र्य देवीची ही मागणी, ही इच्छा आपण सर्वांनी मिळून एकजूटीने, निष्ठेने पूर्ण करायची आहे.

वंदेमातरम !!

© सुश्री प्रेमा माधव कुलकर्णी

कोल्हापूर

फोन नंबर : 0738768883

pmk2146@gmail.com

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares