मराठी साहित्य – जीवनरंग ☆ “त्रिकोण…” ☆ श्री मंगेश मधुकर ☆

श्री मंगेश मधुकर

🔆 जीवनरंग 🔆

☆ “त्रिकोण…” ☆ श्री मंगेश मधुकर

रात्रीचे आठ वाजले तरी घरात अंधार पाहून ऑफिसवरुन आलेल्या विशाखानं लाईट लावले. 

“कशाला लावला गं”सोफ्यावर बसलेली मीना खेकसली.

“अजून किती वेळ अंधारात बसणार” शेजारीच बसलेली छाया डाफरली.

“लाईट असले काय अन नसले काय परिस्थिती काही बदलणार नाहीये” मीना. 

“मलाही हेच म्हणायचंयं.नुसता विचार करून डोकं फुटेल यापलीकडे काहीही होणार नाही.हातपाय हलवायला पाहिजेत.माझं ऐका” .. विशाखाच्या बोलण्यावर दोघींनी काहीच प्रतिक्रिया दिली नाही.

मीना,छाया,विशाखा जॉब करणाऱ्या रूम पार्टनर. वर्षभरापासून भाड्याच्या फ्लॅटमध्ये राहत होत्या.तिघींची छान गट्टी जमलेली.सगळं व्यवस्थित चाललेलं पण दोन दिवसांपूर्वी मीनासोबत ऑफिसमध्ये एक घटना घडली अन सगळं बिनसलं.तिघीही प्रचंड टेन्शनमध्ये.पुढे नक्की काय करावं याविषयी एकमत होतं नव्हतं.आपसात वाद सुरू होते.

दिव्यांग असलेल्या मीनाला अल्पदृष्टीचा त्रास होता तरीही मोठ्या कष्टानं,जिद्दीनं पदवी मिळवली.कॉम्प्युटरमध्ये विशेष प्राविण्य मिळवलं.त्याच जोरावर नावाजलेल्या कंपनीत नोकरी लागली.उत्तम कामामुळे अल्पवधीत मीनाचा बोलबाला झाला.सर्वांशी मिळून मिसळून वागायची तरी तिचा द्वेष करणारे होतेच.सुट्टी असूनही महत्वाचं काम होतं म्हणून मीना ऑफिसला यावं लागलं तेव्हा अजून आठ-दहाजण सहकारी आले होते.संध्याकाळी घरी जायच्या वेळी वॉशरूमच्या बाहेर कोणीतरी मीनाचा हात धरून जवळ ओढण्याचा प्रयत्न केला.मीना जोरात किंचाळली तेव्हा बाकीचे धावत आले. तोपर्यंत हात धरणारा पळून गेला.

“मीना,व्हॉट हॅपन,” 

“केवढ्या जोरात ओरडलीस.” 

“काय झालं” एकामागून एक प्रश्नांचा भडीमार.मीनाचे हातपाय लटपटत होते.

पाणी पिल्यावर सावरली.

“काही नाही.पायात काहितरी आल्यासारखं वाटलं म्हणून जोरात ओरडले.”खोटं बोलून मीनानं वेळ मारून नेली पण खूप घाबरली होती.डोक्यात नाही नाही ते विचार सुरू झाले.रूमवर आली पण चित्त थाऱ्यावर नव्हतं.तोंडावर पांघरून घेऊन पडून राहिली. मात्र विशाखा,छाया आल्यावर मीनाचा बांध फुटला.जोरजोरात रडायला लागली.मीनानं घडलेला प्रकार सांगितला.विशाखा,छायाला प्रचंड धक्का बसला. 

“कोण होता तो हलकट” विशाखा. 

“माहिती नाही”

“म्हणजे”

“लाइट पुरेसे नव्हते त्यात माझा दिसण्याचा प्रॉब्लेम.”

“बाई!! थोडक्यात वाचलीस गं.” मीनाच्या पाठीवरून हात फिरवत छाया म्हणाली. 

“हो गं.जोरात ओरडले म्हणून भामटा पळाला.”

“ऑफिसमध्ये तक्रार केलीस ना” विशाखा.

“नाही”

“का?”

“भीती वाटली.तुमच्याशिवाय खरा प्रकार अजून कोणालाच माहिती नाही.”

“तक्रार केली नाही ते चांगलं केलं,नाहीतर उगीच चर्चेला विषय आणि नसता मनस्ताप” छाया. 

“आता पुढे काय करायचं समजत नाहीये.खूप टेंशन आलंय.मनात गोंधळ आहे.”डोळे पुसत मीना म्हणाली. 

“काही गोंधळ नाहीये. पोलिस,ऑफिसमध्ये तक्रार देऊ.मी सोबत येते.”विशाखा.

“काही झालं नाही ना.मग कशाला विषय वाढवायचा. गप्प बस”छाया.

“आज हात धरला उद्या अजून काही केलं तर..असले विंचू वेळीच ठेचले नाहीतर पुन्हा संधी मिळाली की चावा घेतात.गप्प बसलं की अशा संधीसाधूंची हिंमत वाढते.” विशाखा संतापानं फणफणत होती.

“मीने,हिचं ऐकू नकोस.मला वाटतं सुट्टी घेऊन गावी जाऊन ये.बरं वाटेल.तक्रारीच्या भानगडीत पडलीस तर ‘आ बैल मुझे मार’ अशी अवस्था होईल.अशा घटनेत लोकांना फार इंटरेस्ट असतो.च्युईगमसारखं हाच विषय चघळला जाईल.”छाया. 

“काहीही काय बोलतेस. माणसानं इतकंही घाबरट असू नये.ज्यानं केलं त्याला असाच मोकळा सोडायचा.ते काही नाही.शिक्षा ही व्हायलाच पाहिजे नाहीतर त्याची डेरिंग वाढणार.”विशाखा. 

“मग तक्रार करून काय मिळणारये.आपणच आपल्या इज्जतीचा तमाशा दुनियेला दाखवायचा.एवढं करून हाती काहीच येणार नाही पण मीना मात्र चर्चेचा आणि चेष्टेचा विषय होणार हे नक्की!!त्यापेक्षा जे झालं ते वाईट स्वप्न समजून विसरून जा”छाया. 

“मला पण तसंच वाटतंय आणि तसंही कोणी केलं हे शोधणं अवघडयं.”मीना. 

“आम्ही ठेवला पण सगळेच तुझ्यावर विश्वास ठेवतील असं नाही.हजार प्रश्न विचारतील आणि तसंही तू सांगतीस म्हणून यापलीकडं काहीही पुरावा नाहीये.त्यात तू ऑफिसमधे वेगळचं सांगितलंय.तेव्हा नीट विचार कर.भावनेच्या भरात असा कोणातही निर्णय घेऊ नकोस ज्यानं नंतर पश्चाताप करावा लागेल.”छायाचं बोलणं ऐकून विशाखा भडकली.

“ए बाई,कशाला तिला घाबरवतेस.प्रश्न विचारले तर विचारू दे की..त्याला का घाबरायचं.कर नाही तर डर कशाला?दुसऱ्यानं माती खायची अन त्रास तू सहन करायचा.याला काय अर्थ? आणि पुराव्याचं म्हणशील तर ऑफिसमध्ये सी सी टीव्ही असतील ना.” 

“ज्या ठिकाणी हात धरला तिथं कॅमेरा नाहीये.”मीना.

“पण त्यावेळेला तिथं कोण गेलं हे बाकीच्या कॅमेऱ्यात रेकॉर्ड झालं असेल ना.”

“बाकीचे कॅमेरे चालू आहेत की नाही ते माहीत नाही आणि एकदम सगळ्यांवर संशय घेणं योग्य नाही.पुढे अजून प्रॉब्लेम्स होतील.”मीना. 

“तुझं बरोबरयं.जे घडलं ते सिद्ध करणं अवघड आहे.” छाया

“ते आपलं कामच नाहीये. पोलिस आणि ऑफिस शोधतील.तू लेखी तक्रार कर.”विशाखा. 

“खूप भीती वाटतेय”मीना.

“कशाची?”

“घरी कळलं तर ताबडतोब नोकरी सोडून गावी जाव लागेल नंतर एकदोन वर्षात लग्न की संपलं आयुष्य. सगळ्या शिक्षणाचा चुराडा.”मीना रडायला लागली.

“मीने,बळजबरी नाही पण विचार करून निर्णय घे.निदान ऑफिसमध्ये तरी तक्रार करावी.गुन्हेगाराला शिक्षा व्हायलाच पाहिजे.”विशाखा

“विशे,तिची अवस्था बघून बोल.जीवघेण्या प्रसंगातून वाचलीय.यापुढे ऑफिसमध्ये काळजी घे.सोबतीशिवाय कुठं जाऊ नकोस.आता शांत बसणं हेच चांगलं!!.”

“शांत काय बस.अजून मोठा प्रॉब्लेम झाला म्हणजे..” विशाखाचं ओरडणं छायाला आवडलं नाही.दोघी वाद घालायला लागल्या तेव्हा मीना केविलवाण्या नजरेनं पाहत होती.विशाखा आणि छाया दोघींचे मुद्दे बरोबर होतं. त्यामुळं मीनाचं टेन्शन वाढलं. द्विधा मनस्थिती झाली.

सबुरीचा एक तर आक्रमकतेचा दूसरा आणि निर्नायकी तिसरा असा त्रिकोण झालेला….. 

—-

वाचक हो,

तुम्हाला काय वाटतं .. मीनानं काय करावं….???

© श्री मंगेश मधुकर

मो. 98228 50034

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ अमर प्रेम… ☆ डॉ. शैलजा करोडे ☆

डॉ. शैलजा करोडे

🌸 जीवनरंग 🌸

☆ अमर प्रेम… ☆ डॉ. शैलजा करोडे

लग्नानंतरचा माझा पहिलाच सण आज होता वटपौर्णिमा. लग्न सोहळा, त्यानंतरचे विविध देव दर्शन, नातेवाईकांच्या भेटीगाठी, नवीन सुनेचं कोडकौतुक यातच पंधरा दिवसाचा कालावधी निघून गेला होता. महिन्याची सुट्टी मी व निलेश ने घेतलेली. आता आम्हांला वेळ हवा होता एकमेकांना समजून घेण्याचा, नवजीवनाची स्वप्ने पाहण्याचा, कल्पनेच्या पंखावर स्वार होण्याचा.

आमच्या दरवाज्यावर टकटक झाली. निलेशने दरवाजा उघडला. काका शिरीष आले होते.

” काय करतेय आमची नव परिणित जोडी ” आणि काका मिश्कीलपणे हसत होते. ” काय काका, तुम्हीही चेष्टा करताय लेकरांची “. “तसं नाही रे, पण नवपरिणित दांपत्याला एकांत हवा कि नको, त्याचीच सोय लावून आलोय. आता दुपारच्याच फ्लाईटने तुम्हांला गोव्याला जायचेय. मिरामार बीचवर हाॅटेल फाॅर्चून मध्ये पाच दिवसांचं बुकिंग केलंय तुमचं. सो गाइझ, आँल दि बेस्ट अँन्ड एन्जाॅय “. मी व निलेशने जोडीने काकांचे चरणस्पर्श केले.

हाॅटेलमधील रूम अँलोट झाली, आम्ही सामान ठेवलं अन फ्रेश झालो. हाॅटेल रेस्टाॅरंटमधून चहा मागवला. चहा पितांनाच निलेशने माझ्या कमरेभोवती हात टाकला. ” हे काय निलेश, सोड ना ” ” आता कशाला सोडायचं, जन्मभराची साथ आहे आमची ” ” अरे हो, पण प्रवासानं दमलेय ना मी “. ” अग, मग तुझा थकवा दूर करतो ना मी, पाय चेपू कि डोक्याला बाम लावू “. माझा चेहरा गोरामोरा झाला होता. चेहर्‍यावर नकळत भितीचं सावट पसरलं होतं. अंगावर शहारे आले होते. ” काय झालं निलिमा, काय होतंय तुला, घाबरू नकोस सखी, तुला त्रास होईल असलं कोणतंही वर्तन मी करणार नाही ” म्हणत निलेशने माझ्या चेहर्‍यावर दोन्ही हात ठेवले, डोळ्यात डोळे घालून पाहू लागला, त्या डोळ्यात मला दिलासा देण्याचा प्रयत्न होता, विनंती होती, आर्जव होतं. ” निलिमा तू थोडा आराम कर. मग सायंकाळी थोडं दोना पावला बीचवर फिरून येऊ. त्यानंतर मस्तपैकी जेवण करू.

निलेशच्या समंजस स्वभावाने मला बराच धीर आला होता,

” अहो माझी बहीण हेमानं निलिमासाठी स्थळ सुचवलंय. मुलगा उच्च शिक्षित आहे. आर्मड फोर्समध्ये फ्लाईट लेफ्टनंट आहे. माणसे सुस्वभावी आहेत. नीलिमाची आई ज्योती तिच्या बाबांशी, प्रकाशरावांशी बोलत होती. ” नाही ज्योती, मला नाही आर्मीतील मुलाला मुलगी द्यायची. सगळं काही चांगलं असलं तरी जीवाची हमी शुन्य असते याठिकाणी. माझी एकुलती एक मुलगी. तिच्या भवितव्यावर नेहमी टांगती तलवार नको आहे मला. ” ” अहो पण एकदा मुलगा तर पाहून घ्या आणि निर्णय निलिमाला घेऊ द्या ना तुम्ही “, ” तुम्ही आणि तुमची बहीण काहीही करा दोघीजणी. ” प्रकाशरावांनी विषय तिथंच संपविला होता. पण देखणा, राजबिंडा, उच्चशिक्षित, आर्मफोर्समधील निलेशला पाहाताच निलिमा प्रभावित झाली. गोरीपान, निळे डोळे, काहीसे सोनेरी केस, उच्चशिक्षित, बँक अधिकारी असलेली निलिमा निलेशलाही भावली. मग कोणतंही देणंघेणं, हुंडा, मानपानाशिवाय, तसेच पत्रिका जमवणं या सोपस्कराशिवाय शुभमंगल पार पडलं होतं.

“ उद्या आपण सगळ्या जणी जरीकाठाच्या साड्या व मॅचिंग ज्वेलरीसह येऊ आँफिसला “ …माझी सहकारी आशा विधाते बोलत होती. “जरीकाठाची साडी ठीक आहे, पण रंग मात्र कोणताही असू दे. त्याचं बंधन नको बाई “. शलाका परांजपे बोलत होती. ” ठीक आहे ना, रंग आपापल्या पसंतीचा ” मीनाक्षी देशमुख म्हणाली. विद्या घोडके व आरती पाटील आँफिस प्यून सावित्रीसह हळदी कुंकवाचं साहित्य व वाण खरेदीसाठी आज जाऊन आल्या होत्या.

निलिमा तू हळदीकुंकू लाव सगळ्यांना. हेमा लोखंडे बोलत होती “नको आज माझी तब्येत बरी नाही. शलाका लावेल हळदीकुंकू ” आशा विधातेने हेमाचा तळहात दाबून खूण केली हे निलिमाच्या नजरेतून सुटले नाही.

तिळाचे लाडू व नाष्टा सगळ्यांनी सेवन केला. उखाण्यांचाही कार्यक्रम झाला. उखाणा घेण्याचा नंबर निलीमाचा आला. आणि सगळ्याजणी शांत झाल्या. ” मी घेते ना उखाणा. निलेश येणार परत. त्याला काहीही झालेलं नाही. शत्रूंनी त्याचं विमान उडवलं, तो बेपत्ता झाला. त्याचा ठाव ठिकाणा नाही की त्याची डेड बाॅडीही मिळाली नाही. माझं प्रेम मला सांगतय तो जीवंत आहे आणि येणार परत. घेते मी उखाणा.

” नवपर्वाची पहाट होऊन निलेश आला माझ्या जीवनी

तूच माझा सखा अन मी तुझी अनुरागिणी ”

निलिमाने उखाणा तर घेतला पण दोन अश्रू तिच्याही नकळत गालावरून ओघळले होते.

हेमा, विद्या, शलाका यांनी हळूच निलिमाच्या खांद्यावर हात ठेवला. ” आय अँम ओ के, मला काही झालेलं नाही. आय अँम हॅपी ” निलिमा उद्गारली. ” होय निलिमा तुला काही झालेलं नाही. आता जायचं का आपण. ” आणि सर्वजणी आँफिसातून बाहेर पडल्या.

अक्षय तृतीयेसाठी निलिमाने आॅफिसला रजा टाकलेली. यादिवशी भगवान विष्णूचे पूजन, जप, नामस्मरण, उपवासादी कर्म ती करायची. गरीबांना दान स्वरूप मातीचे भांडे, जवस, आंबा, छत्री, पादत्राणे, कपडे इ. वाटायची. यादिवशी केलेलं दान अक्षय असतं व दुपटीनं आपल्याकडे परत येतं यावर तिचा ठाम विश्वास होता. आणि असंच अक्षय प्रेम माझं निलेशवर आहे आणि तो येणारच ही तिची दृढ मनोधारणा होती. सगळा विधी यथासांग पार पडला अन तिनं सुटकेचा निःश्वास सोडला.

नेहमी मरगळलेल्या निलिमाच्या चित्तवृत्ती आज फुलून आल्या होत्या. हे तिलाही जाणवत होतं. आरशातील तिचं प्रतिबिंब तिलाच नवखं वाटलं.

आणि दुपारी आर्मफोर्सच्या आँफिसातून फोन आला होता. घनदाट जंगलात टेहळणी करतांना एका आदिवासी पाड्यावर निलेश सापडला होता. पण त्याचा पूर्ण स्मृतिभ्रंश झालेला.

शत्रूंनी त्याचं विमान उडवलं अन विमान भेलकांडत खाली येत असतांनाच निलेशने उडी मारली. पण जमिनीवर आदळतांना मेंदूला मार बसून त्याचा स्मृतिभ्रंश झाला होता. ही माहिती त्या आदिवासी पाड्यावरील लोकांनी दिली होती.

“आम्ही येतो निलेशच्या भेटीला”, निलेशचे बाबा पतंगराव बोलत होते.

” बाबा आम्ही निलेशलाच घरी घेऊन येतोय. कदाचित घर व आपली माणसं पाहून त्याची स्मृती परत येईल “.

निलेश आपल्या रूममध्ये आराम करीत होता. निलीमाची चाहुल लागताच त्याची झोप चाळवली. ” कोण? काय हवंय तुम्हांला? ” निलेश असं काय करतोस? आपल्या निलीमाला विसरलास? अन त्याचा चेहरा आपल्या दोन्ही हातात घेऊन तिने नजरेला नजर भिडवली. आणि त्या अपरिचित डोळ्यात एक चमक आली, ओठांवर हास्य आलं. स्पर्शाची ऊब कळली, श्वासातला आपलेपणा जाणवला आणि निलेशला सगळं काही उमगलं. ” माझी निलू ” म्हणत त्यानं तिला आपल्या बाहुपाशात ओढलं.

निलिमाचं गहिरं प्रेम आज जिंकलं होतं. सुखाचा अक्षय ठेवा तिला पुन्हा मिळाला होता.

© डॉ. शैलजा करोडे

नेरुळ नवी मुंबई मो. 9764808391

ईमेल – karodeshailaja@gmail.com 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ ती… भाग – २  ☆ सुश्री मंजुषा सुनीत मुळे  ☆

सुश्री मंजुषा सुनीत मुळे

? जीवनरंग ?

☆ ती… भाग – २  ☆ सुश्री मंजुषा सुनीत मुळे 

(सासूबाईंनी अलगद ते घर तिच्या ताब्यात दिलं होतं, याचं फार अप्रूप वाटायचं तिला. तिचं आवर्जून कौतुक केलं नाही, तरी कशाबद्दल तक्रारही नसायची त्यांची. तिने घर छान सजवलं होतं… घरकामाबद्दल प्रश्नच नव्हता. तिचं वैवाहिक आयुष्य सुरळीत चालू झालं.) इथून पुढे — 

तारांबळ उडवणारा प्रश्न एकच होता… नवऱ्याच्या सात-आठ हजार रुपये पगारात मनासारखं जगणं कसं जमवायचं हा. यथाकाल नव्या पाहुण्याची चाहूल लागली. दोघांच्याही आनंदाला पारावार राहिला नव्हता. तो जमेल तसं तिचं कोडकौतुक करत होता. एका शुभदिवशी तिला मुलगी झाली. आयुष्याने एक नवं वळण घेतलं. तिचं काम वाढलं. खर्चही वाढला. पण ती मनापासून बदलत्या परिस्थितीशी जुळवून घेत होती. चाळीतल्या समवयस्क मैत्रिणींसोबत विचारांची, समस्यांची देवाण-घेवाण करतांना स्वत:च्या प्रश्नांची उत्तरं स्वत:च शोधायची असतात ही खूणगाठ नकळतच बांधली गेली होती. सव्वा वर्षाने पुन्हा नवी चाहूल लागली. योग्य वेळी प्रसूती होऊन, दुसरी मुलगी झाली. मुलगा व्हायला हवा होता, असं अभावितपणे वाटून गेलं खरं क्षणभरच. मुलगा होवो किंवा मुलगी… आईला प्रेमाचा पान्हा फुटतोच… आणि तसाच खर्चालाही पाझर फुटला… कसरत वाढली.

एक दिवस नवऱ्याने नोकरीसाठीची जाहिरात वाचली. आणि मनावर दगड ठेवत, तिला अनपेक्षितपणे सुचवलं की ती नोकरी तिला करण्यासारखी होती. १२ वी पास असणं, एवढीच शिक्षणाची अट होती. वयाच्या अटीत तर ती बसत होतीच. महानगरपालिकेच्या मुख्य कार्यालयात जावं लागेल, ही एक अट मात्र अटकाव करणारी होती. मुंबईत ती चांगलीच रुळली होती. पण एकटीने लोकलच काय, बसने प्रवास करणं तरी तिला जमेल का, हाच मोठा प्रश्न होता. आजपर्यंत घर हेच तिचं विश्व होतं. त्या पलिकडेही जग असतं, हे ती जणू विसरलीच होती. पण घरातला पैशाचा ओघ वाढणं अत्यावश्यक होतं. आई-वडलांच्या औषधपाण्याचा, मुलींच्या शाळेचा खर्च दिवसेंदिवस वाढतच होता. आणि त्याचे दोन हात कमी पडायला लागले होते. त्याने नाईलाजाने तिला नोकरीसाठी अर्ज करायची गळ घातली. तिलाही परिस्थिती कळत होती. पैशांची वाढती गरज कळत होती. एकीकडे स्वत: पैसे कमवण्याचा विचार भुरळ घालत होता. पण मनात प्रचंड भीतीही दाटून आली होती. रोज एकटीने इतक्या लांबचा प्रवास करायचा, त्या प्रचंड गर्दीत तग धरून रहायचं, अनोळखी लोकांमध्ये दिवसभर वावरायचं… आणि काम? कित्येक महिन्यात पेन हातात घेतलं नव्हतं… ते सरकारी काम… समजणार होतं का? जमणार होतं का? … आणि मुलींचं, सासू-सासऱ्यांचं काय? त्यांना कोण बघेल? … असंख्य प्रश्न मनाला घेरून, आणखीच घाबरवत होते. ‘‘अगं, अर्ज करून पहायला काय हरकत आहे? लगेच नोकरी मिळेलच असं नाही”… हे त्याचं म्हणणं तिने पटवून घेतलं… अर्ज केला. मुलाखतीला बोलावलं गेलं… प्रचंड घाबरलेल्या अवस्थेत तिने कशीतरी मुलाखत दिली… आणि आश्चर्य म्हणजे, महिनाभरात नेमणुकीचं पत्र मिळालं… तिची खरी सत्त्वपरिक्षा सुरू झाली.

चाळीतल्या एक काकू माफक पैशात मुलींना सांभाळायला तयार झाल्या. पण तिला नोकरी मिळाली तरीही घरकामाला बाई ठेवणं अशक्यच होतं. कारण नोकरी ‘लोअर डिव्हिजन क्लार्क’ची… पगारही त्यामुळे त्याच बेताचा. सासू-सासऱ्यांना वेळेवर जेवायला द्यायला एक मोलकरीण तयार झाली. तिचा पगार हा अपरिहार्य खर्च होता. एक एक करत सगळ्याची सोय झाली. हा खर्च वजा जाता तिच्या हातात चार-पाच हजार तरी उरू शकतील, असा तिचा हिशोब होता. आता स्वत:च्या मनाला घोड्यावर बसवणं, हे सगळ्यात अवघड काम राहिलं होतं.

नवऱ्याच्या विश्वासाचा हात घट्ट धरून तेही काम मार्गी लागलं… आणि तिची नोकरी सुरू झाली. आयुष्य खूप वेगाने पुढे पळू लागलं आणि आठवणींची झाडंही त्याच वेगाने मागे पळायला लागली… एक एक करत, मागे जात, दिसेनाशी व्हायला लागली… लोकलच्या खिडकीतून व्हायची तशीच… मुंबईत पहिल्यांदा पाय ठेवला, तेव्हा बरोबर एक स्वप्नांचं गाठोडंही आणलं होतं तिने. त्यामानाने लहान असलेल्या त्या गाठोड्यातली स्वप्नंही खरंतर लहान-लहानच होती… राणीचा बाग पहायचा… म्हातारीच्या बुटात चढून बघायचं… रस्तोरस्ती कितीतरी विविध वस्तूंचा बाजार भरतो म्हणे… मनात आलं की तिथे चक्कर मारून, हवी ती छोटी-छोटी खरेदी करायची… मिठागरं बघायची उत्सुकता तर खूप होती… शिवाय डबल-डेकर बस म्हणजे नेमकी कशी बस ते पहायचं होतं… त्यातून फिरायचं होतं… आणि सगळ्यात मोठं स्वप्न होतं ते मुंबईचा समुद्र बघायचं… जन्मापासून त्या सुंदर समुद्राशी जोडली गेलेली नाळ अजिबात तुटू द्यायची नाही, हे मुंबईलाही समुद्र आहे असं कळल्याकळल्या तिने पक्कं ठरवलं होतं… पण आयुष्य त्या चाळीच्या विश्वात गुरफटून गेलं, तशी ही इवलीशी स्वप्नंही मनाच्या गाठोड्यात गुरफटली गेली… गुदमरून गेली… हळूहळू विस्मरणातही गेली.

काळ धावत होता. मुली मोठ्या झाल्या. कसंही करून पदवीपर्यंत त्यांना शिकवायचंच् हा तिचा निर्धार स्वत:च्या बाबतीत काटकसर करत ती तडीला नेत होती. ती आणि नवरा दोघेही फक्त बारावी पास. त्यामुळे स्टोअर कीपर आणि एल्. डी. सी. या दोन्ही पदांच्या उन्नतीचा प्रश्नच नव्हता… लोकलमधल्या आणि ऑफिसमधल्या भिशीत नियमित भाग घेऊन, पगार वाढला तरी त्या वाढीला हातही न लावता, काही रक्कम, थोडे फार सोने, बाजूला टाकले होते. पाठोपाठच्या मुलींची लग्नेही पाठोपाठ करावी लागणार होती म्हणून खूप आधीच, स्वत:च्या लग्नात आई-वडलांनी घातलेल्या चार बांगड्या आणि एक छोटं नेकलेस फार न वापरता तिने तसंच ठेवलं होतं. मुली दिसायला नीटस होत्या. समजूतदार-सुस्वभावी होत्या. पदवी परीक्षा झाल्याझाल्याच दोघींनाही खात्या-पित्या घरातली स्थळं सांगून आली. स्वत:चे हात रिकामे असतांना समोरच्याचे हात गच्च भरलेले नाहीत म्हणून तक्रार का करायची, हा तिचा साधा-सरळ विचार होता. आणि दोन्ही भावी जावईही निर्व्यसनी, दिसायला तरतरीत होते. फारशा जबाबदाऱ्याही नव्हत्या त्यांच्यावर. पगारही समाधानकारक होते. आणि याहून अधिक विचार करायला तिला वाव तरी कुठे होता? एका वर्षाच्या अंतराने दोघीही सासरी गेल्या. पण पैशाचे अपुरेपण मात्र घरात कायमचे ठाण मांडून बसले होते. दोघींच्याही लग्नासाठी काही कर्ज घ्यावे लागले होते. मुलींवरच्या खर्चाची जागा मग कर्जाच्या हप्त्यांनी घेतली; इतकाच काय तो फरक.

… इतक्या वर्षांच्या धावपळीने तिचं फक्त शरीरच नाही, तर मनही पार थकून गेलं होतं… पण आता ते अतिशय तटस्थ, शांत आणि कमालीचं कणखरही झालं होतं. इतकी वर्षं आटोकाट प्रयत्न करून, न थकता सांभाळलेलं जबाबदाऱ्यांचं ओझं थोडं कमी झालं होतं खरं. पण म्हणून लगेच नोकरी सोडण्याचा विचार करणं अशक्य होतं. एखाद्या वर्षात नवऱ्याची नोकरी संपणार होती, तरी तिची ४-५ वर्षं शिल्लक होती. त्याच्या खाजगी नोकरीत पेन्शन हा प्रकार नव्हताच. थोडा फार फंड मिळणार असला, तरी दोघांच्या म्हातारपणाची सोय त्यातूनच करायची होती. शिवाय निवृत्तीचं वय होण्याआधीच तिने नोकरी सोडली असती तर तिला मिळू शकणाऱ्या पेन्शनचा आकडा कमी झाला असता. त्यामुळे तो प्रश्नच नव्हता. कितीही दमली-थकली असली, प्रकृती त्रास द्यायला लागली असली, तरी मध्येच नोकरी सोडून देण्याचा विचारही ती करू शकत नव्हती. आता पाय झपझप चालत नव्हते… ओढावे लागत होते. पण सगळं काही सहन करत, सकाळची ९ वाजून सात मिनिटांनी सुटणारी लोकल पकडणं अनिवार्यच होतं… 

…. पण अलिकडे या रहाटगाडग्यासारख्या फिरणाऱ्या आयुष्यात, आता एक स्वप्न मात्र नव्याने तिला साद घालत होतं…पूर्वीसारखंच अगदी छोटंसं….. निवृत्त होण्याआधी निदान एका महिन्यापुरता तरी त्या ९-०७ च्या लोकलच्या फर्स्टक्लासचा पास काढायचा, आणि जरा चांगल्या साड्यांचे, ड्रेसचे धक्के खात, मधूनच दरवळणारा परफ्यूमचा वास घेत ऑफिसला पोहोचायचं… आणि मगच रिटायर व्हायचं… बस्… एवढंच एक छोटंसं स्वप्न.. तसं खरं तर शेवटचंच…… पण हे तरी पूर्ण होईल ना? – 

…. ती पुन्हा शांतपणे त्या गर्दीत मिसळून जायची.

समाप्त – 

© सुश्री मंजुषा सुनीत मुळे

सांगली 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ ती… भाग – १  ☆ सुश्री मंजुषा सुनीत मुळे  ☆

सुश्री मंजुषा सुनीत मुळे

? जीवनरंग ?

☆ ती… भाग – १  ☆ सुश्री मंजुषा सुनीत मुळे 

साडेआठ वाजले तसा पर्समध्ये डबा आणि चपलेत पाय कसेतरी कोंबून ती घाईघाईने घराबाहेर पडली. कितीही भरभर चालली तरी स्टेशनपर्यंत पोहोचायला अर्धा तास तरी लागायचाच. त्यामुळे नऊ सातची लोकल पकडायची तर साडेआठ वाजता घराबाहेर पडायला पर्यायच नसायचा. आणि लोकलमध्ये बसायला जागा मिळेल याची शाश्वती कधीच नसायची. कारण याबाबतीत ‘हाजीर तो वजीर’ हा एकच नियम होता. आणि बरेचदा तिला ५, ७ मिनिटं उशीरच व्हायचा निघायला.

खरंतर पहाटे ४-४॥ वाजताच उठायची ती. आणि इतरांची झोपमोड होऊ नये याची काळजी घेत स्वयंपाकाचे काम उरकतांना त्रेधा उडायची तिची. सहा सव्वासहा वाजता, तिचा नवरा सोडून बाकी सगळे उठायचे. बाकी सगळे म्हणजे तिच्या दोन मुली आणि सासू-सासरे. साखर झोपेत असणाऱ्या दहा आणि बारा वयाच्या त्या मुलींना जबरदस्तीने उठवायचं रोजच तिच्या खूप जिवावर यायचं… वाईट वाटायचं. पण त्याशिवाय गत्यंतर नव्हतं. कसंतरी त्यांचं चहापाणी, अंघोळ वगैरे उरकून, एकदा त्यांच्या घट्ट वेण्या घालून दिल्या, की मग सासू-सासऱ्यांचा नंबर असायचा. दोघांचंही तसं वय झालं होतं. सासऱ्यांचा एक पाय अर्धांगवायू होता होता वाचला होता, पण त्याला साहजिकच अधूपणा आला होता. सकाळचं सगळं आवरतांना त्यांना तिची मदत घ्यावीच लागायची. सासूबाई शरीराइतक्याच मनानेही खूप थकलेल्या होत्या. त्यांचा भार स्वत: पेलत त्यांना बाथरूममध्ये नेऊन, सगळं आवरून पुन्हा कॉटवर झोपवण्यापर्यंतची सगळी जबाबदारी जणू तिच्या एकटीचीच होती. पण त्याबद्दल तिच्या तोंडून तक्रारीचा एकही शब्द कधी उच्चारला जात नव्हता. तिचं जन्मजात कर्तव्यच होतं ना ते. मग पडलेले सगळे कपडे पटापट धुवून वाळत घालायचे. पडलेली भांडी घासून टाकायची. केरवारे करायचे. आधीच करून ठेवलेला नाष्टा सगळ्यांना द्यायचा. तोपर्यंत नवरा उठायचा. मग त्याचे ताल सांभाळत कसंतरी स्वत:चं आवरून घ्यायचं. मुलींचा आणि स्वत:चा डबा भरायचा … ही तिची सतत चाललेली धावपळ अतिशय त्रयस्थपणे आणि निर्विकारपणे पहाणारं भिंतीवरचं पिवळं पडलेलं घड्याळ, साडेआठचा ठोका पाडण्यासाठी जणू आसुसलेलं असायचं, आणि तो ठोका पडताच, मुलींकडे, नवऱ्याकडे, आणि राहून गेलेल्या कामांकडे अक्षरश: पाठ फिरवून ती घराबाहेर पडायची.

आजही ती तशीच बाहेर पडून, तरातरा चालत स्टेशनच्या दिशेने निघाली… त्याक्षणी तसं तरातरा चालणं हे आयुष्याचं एकमेव ध्येय असल्यासारखी… आणि आज गाडी प्लॅटफॉर्मवर लागत असतांनाच ती चक्क नेहेमीच्या ठरलेल्या डब्यापर्यंत पोहोचलीही होती. पटकन् डब्यात चढून आत जाताजाता खिडकीजवळची एक सीट रिकामी दिसली, आणि तिने अक्षरश: झेप घेत ती जागा पटकावली. ‘या गाडीला घरी काही कामं-धामं नसतात वाटतं… ठरल्यावेळी रोजच नेमकी कशी पोहोचते प्लॅटफॉर्मवर? ’… हा न चुकता रोज मनात येणारा गंमतीदार विचार आज तिने मनापासून एन्जॉय केला आणि ती जाम खूश झाली… कारण आज तिला बसायला, तेही खिडकीजवळ बसायला जागा मिळाली होती. आता पुढचा तास-सव्वा तास तरी तिला एकही धक्का पचवावा लागणार नव्हता. कारण आता एकदम शेवटचं स्टेशन येईपर्यंत, ती एका जागी निवांत बसू शकणार होती. आज हा वेळ फक्त तिचा एकटीचा होता… फक्त तिच्या एकटीचा. रोजच्या ओळखीच्या चेहेऱ्यांकडे पाहून ओळखीच्या हसण्याची देवाण-घेवाण झाल्यानंतर, त्या खिडकीच्या चौकटीवर हात टाकून ती निवांतपणे बाहेर बघत बसली. ती खिडकी म्हणजे आपल्या जिवलग मैत्रिणीचा हक्काचा खांदा आहे असं तिला मनापासून वाटून गेलं… आणि तिचं मन एकदम हलकं झालं. मग मागे पळणाऱ्या झाडांबरोबर तिचं मनही मागे कधी पळायला लागलं ते तिलाही कळलं नाही.

… रत्नागिरी जवळचं ‘वारे’ गाव हे तिचं माहेर… अतिशय रम्य, प्रसन्न, छोटंसं, सुंदर गाव… एकीकडे नितळ निळाशार शांत समुद्र… पांढरट, पिवळ्या वाळूची स्वच्छ चादर पांघरलेला समुद्रकिनारा… पहावं तिथे सुखद-गार वाऱ्याबरोबर मजेत डोलणारी नारळी-पोफळीची, सुरुची झाडं… अलिकडे आंब्याच्या झाडांमध्ये शांतपणे विसावलेली, लाल कौलांनी शाकारलेली, टुमदार बैठी घरं… शेणाने स्वच्छ सारवून, छोट्या पण सुबक रांगोळीने सजलेली अंगणं… लहान मोठ्या प्रत्येक घराच्या अंगणात तुळशी-वृंदावनात विसावलेली, शांत डुलणारी तजेलदार तुळस… आणि अंगणाच्या सभोवताली अनेक प्रकारची फुलझाडं… कुणालाही पाहताक्षणी मोहात पाडणारं हे तिचं अतिशय आवडतं माहेर गाव. त्यातलंच एक, सदैव आनंदाने-समाधानाने फुलून राहिलेलं तिचं माहेरघर… तिच्यावर जीवापाड प्रेम करणारे तिचे आई-वडील… दोघे मोठे भाऊ. पैशाची श्रीमंती फारशी नसली, तरी मनाने कमालीची श्रीमंत असणारी ही माणसं… …. बघताबघता ती कधी तिथे पोहोचली हे तिला कळलंही नाही… नेहेमीच्याच स्टेशनांवर लोकल थांबत होती… उतरणारे-चढणारे चेहेरेही बहुतांशी तेच होते. पण ती मात्र त्याक्षणी जणू तिथे नव्हतीच. एव्हाना तिची ओट्याशी उभ्या असलेल्या तिच्या आईला मागून जाऊन घट्ट मिठी मारूनही झाली होती. वडलांच्या कुशीत विसावून झालं होतं. दोन्ही भावांचे हात पकडून आनंदाने गिरक्या मारून झाल्या होत्या. मग धावतच अंगणात भिरभिरून झालं होतं. सगळ्या झाडांशी गप्पा मारून झाल्या होत्या. आणि आत्ता आईच्या हातचं खमंग थालिपीठ चवीचवीने खात ती अंगणाच्या पायरीवर निवांत बसून आठवणीत रमली होती…..

…. अगदी सहजपणे ती दहावीपर्यंत ज्या शाळेत शिकली होती, ती शाळा, सगळ्या बाई, सगळ्या शाळू-सोबती… सगळं सगळं डोळ्यांसमोर तरळून जात होतं. मोठे दोघे पाठोपाठचे भाऊ रत्नागिरीतल्या कॉलेजमध्ये शिकत होते. हिनेही हट्ट धरल्यावर वडलांनी तिथेच तिचं ११ वी साठी नाव घातलं होतं. तीन तीन मुलांना कॉलेजमध्ये घालतांना वडलांची किती ओढाताण होत होती, हे सत्य तिच्यापर्यंत कधीच पोहोचलं नव्हतं. ती काही खूप हुशार नव्हती. अगदी मन लावून अभ्यास करूनही १२ वीत जेमतेम ५५% पर्यंत पोहोचली होती. पण आईच्या हाताखाली घरकामात मात्र बरीच तरबेज झाली होती. १२ वी नंतर तिचं शिक्षण थांबवावं लागलं. वडील स्थळं शोधायला लागलेच होते. तिचं रहाणं-दिसणं साधंसुधं असलं तरी ती चुणचुणीत होती. लवकरच हे मुंबईचं स्थळ आलं. मुलगाही १२ वी पर्यंत शिकलेला, पण स्मार्ट होता. एका चांगल्या कंपनीत स्टोअर-कीपर म्हणून नोकरी करत होता. स्वत:चं घरदार वगैरे नव्हतं, पण मुंबईत ते असणं, त्याचं वय लक्षात घेता तसं कठीणच असणार, असं सहज गृहीत धरलं गेलं होतं. त्याच्या दोन मोठ्या बहिणी त्यांच्या सासरी सुखात होत्या. त्यामुळे आई-वडील-मुलगा एवढीच माणसं घरात असणार होती. शिवाय ते स्थळ ओळखीतून आलेलं… मग लग्न ठरवायला कितीसा उशीर लागणार? तिलाही मुलगा आवडला, आणि मुंबईला जायला-रहायला मिळणार याचा आनंद तर काकणभर जास्तच होता, इतकं मुंबईबद्दल ऐकलं होतं… नाही म्हणण्याचा प्रश्नच नव्हता. पुढे चारच महिन्यात वडिलांनी त्यांच्या परीने थाटात लग्न करून दिलं, आणि ती नवी नवरी मुंबईत आली…

… डब्यात एकदम गडबड, गलका सुरू झाला, आणि ती भानावर आली. शेवटचं स्टेशन आलं होतं. डब्याच्या दाराशी उतरण्यासाठी झुंबड उडाली होती. तिला मात्र आज तिथेच तसंच बसून रहावंसं वाटत होतं. पण ते शक्य नव्हतं. सावकाशीने उठून, सगळ्यांच्या शेवटी ती खाली उतरली. आता मात्र पावलं सवयीनेच झपझप पडायला लागली. पण आज मन मात्र सारखं आठवणीत रेंगाळत होतं.

अतिशय उत्सुकतेने नवरा आणि खूप सारी स्वप्नं यांच्या बरोबर ती मुंबईला आली. एका चाळीतल्या वरच्या मजल्यावर त्याचं घर होतं. पण इतकं लहान? … वन रूम – किचन – थोडी रुंद पण स्वतंत्र गॅलरी…. बस् एवढंच्? क्षणभर दचकली होती ती. अंगण नाही… फुलझाडं नाहीत… तुळशी वृंदावन नाही… पण तिने लगेच स्वत:ला सावरलं… होईल की पुढे-मागे स्वत:चं घर असं स्वत:ला सहज समजावलं तिने, आणि मग ते घर तिला मनापासून आपलं वाटलं. सासूबाईंनी अलगद ते घर तिच्या ताब्यात दिलं होतं, याचं फार अप्रूप वाटायचं तिला. तिचं आवर्जून कौतुक केलं नाही, तरी कशाबद्दल तक्रारही नसायची त्यांची. तिने घर छान सजवलं होतं… घरकामाबद्दल प्रश्नच नव्हता. तिचं वैवाहिक आयुष्य सुरळीत चालू झालं.

– क्रमशः भाग पहिला 

© सुश्री मंजुषा सुनीत मुळे

सांगली 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ सुगी… भाग-३ ☆ श्री आनंदहरी ☆

श्री आनंदहरी

? जीवनरंग ?

 ☆ सुगी… भाग-३ ☆ श्री आनंदहरी 

(“ न्हाय व्हय ? मला आपलं वाटलं..नसंल तर ऱ्हाऊदेल..”

सुमा त्याच्या डोळ्यांत पहात म्हणाली.. तो गडबडला.ते पाहून हसत म्हणाली,

“ सजागती गंमत केली तुमची. चला, आय वाट बगीत आसंल..”) – इथून पुढे — 

सुमा माळवं तोडाय येरवाळीच रानात आली होती. तालुक्याचा आठवड्याच्या बाजारचा दिवस. बाजारदिवशी तालुक्यासने दिवसातून चारवेळा एसटीच्या बाजारगाड्या यायच्या. साडेअकराच्या गाडीनं माळवं घेऊन गेलं का दोनच्या नाहीतर चारच्या गाडीनं माळवं विकून घरी येता यायचं. इत्तर दिवशी एकच गाडी मुक्कामाला येणारी आणि सकाळी जाणारी.

जयसिंगशी बोलायचे असल्यामुळे ती नेहमीपेक्षा जरा लवकरच रानात आली होती. माळवं तोडण्यात सुमी गर्क होती. जयसिंग आल्याचंही तिच्या लक्षात आलं नव्हतं. जयसिंग दूर उभा राहून आचंबीत करणारा सुमीचा कामातला उरक पहात होता.

“ बसा वाईच बांदावं.. “

जयसिंग आल्याचं ध्यानात येताच ती त्याला म्हणाली.

“ मी तोडू लागतो की माळवं..?”

“ नगं, त्येनं लय येळ लागंल..”

“ ती कसं.. उरकंल न्हवका झटशिरी..”

“ नगं, तुमचं ध्यान काय रानातल्या माळव्याव ऱ्हायाचं न्हाय.. आन त्येच्यामुळं माजं ध्यान तुमाकडं जात ऱ्हाईल.. रानातलं माळवं तोडायचं ऱ्हाऊन जाईल.. बसा तकडं बांदाव.. वाईच ऱ्हायलंय तोडायचं…. आल्येच बगा..”

मिश्किलपणाने हासत सुमी म्हणाली. जयसिंगने मनोमन सुखावत ‘ कायबी झालं तरी हिच्याशीच लगीन करायचं ‘ असा निश्चय केला. थोड्या वेळात माळव्याची पाटी घेऊन सुमी बांदाकडं आली.. बरचसं अंतर ठेवून बसली.

“ ह्ये बगा.. मी काय सांगत्येय तुमास्नी त्ये कान देऊन ऐका.. त्येच्याव इचार करा..”

“ इचार काय करायचा हाय.. माजा जीव तुज्याव जडलाय.. तुजी बी ना न्हाय.. मंग दुसरं काय बी असूनदेल मला तुज्यासंगं लगीन करायचंच हाय. “

“ ऐकून तरी घ्या.. मला तुमास्नी फसवायचं न्हाय.. माज येक लगीन याद्याच्या वक्ताला मोडल्यालं हाय…..”

सुमीने त्याला लग्न मोडल्याची सगळी घटना सविस्तर सांगितली. स्वतःला पांढरा डाग असल्याचं सांगितलं आणि म्हणाली,

“ सावचित इचार करा. उगा घाई करू नगा. मी ही न सांगता होय म्हणलं आस्तं.. तर ती फशीवल्यागत झालं आस्तं. मला तुमास्नी फसवायचं, अंदारात ठेवायचं न्हाय.. नवरा-बायकूच्या नात्यात इस्वास पायजेल. आसं हाय म्हणल्याव तुमच्या घरचा इरोध असणार, पावनं-पै बोलणार.. समदा इचार करा. आन तरीबी तुमाला माज्यासंगंच लगीन करायचं आसंल तर तालुक्याला चारच्या येष्टीआगुदर या.. तुमी आला न्हाय तर मी समजून घिन…”

तिनं डोक्यावर चुंबळ ठेवून माळव्याची पाटी उचलून घेतली. विषयामुळे आलेली गंभीरता कमी करण्यासाठी हसत त्याला म्हणाली,

“ उठा आता.. आन रानाकडं जावा….

काय बी आसलं, तुमी तालुक्याला आला.. न्हाय आला तरीबी सांच्याला च्या प्याला घरला याचंच हाय ही इसरू नगा.. “

सुमा माळवं घेऊन झपाट्याने निघून गेली. जयसिंग ती दृष्टीआड होईपर्यंत पाठमोऱ्या तिच्याकडे पाहत राहिला होता. ती दिसेनाशी झाल्यावर तो उठला. रानाकडे जाताना तिचे प्रत्येक वाक्य त्याला आठवत होतं. ती म्हणाल्याप्रमाणे त्याच्या घरचा होणारा विरोध, पाहुण्या- पै मध्ये होणारी चर्चा… सारा त्याच्या मनात चित्रपटासारखं दृश्यमान होत होतं. बाहेर कुणाला काही ठाऊक नसलं तरी रंगातात्यांना, वहिनीला सगळं ठाऊक असणार आणि त्यामुळे आपण कितीही घरच्यांपासून सारं दडवून लग्न करायचं म्हणलं तरी ते शक्य होणार नाही. तात्या, वहिनी घरी सांगणारच.. काय करावं ?, कसं करावं ? अनेक प्रश्नांच्या जाळ्यात जयसिंग गुरफटत चालला होता.

सुमीचं माळवं दोनच्या गाडीआधीच विकले गेले होते.. पण जयसिंगला चारची गाडी सांगितल्याने तिने बाजारातच फिरत राहून दोनची गाडी चुकवली. जयसिंगला सारं सांगितल्यामुळे तिच्या मनावरचा ताण कमी झाला होता. जयसिंग तिला आवडत होता.. त्याच्याशी लग्न व्हावे असे तिलाही वाटत होतं.. तो निश्चित येईल असे तिचे मन तिला सांगत असलं तरी आपलं मन आपल्याला हवं असतं त्येच सांगत असतं.. हे ही तिला ठाऊक होतं. आपल्याला व्हावंसं वाटते तसंच घडतं असं नाही हे ती अनुभवाने जाणत होती.. त्यामुळे जयसिंग येईल का ? की नाही येणार ? या प्रश्नाच्या उत्तरात तिचं मन घड्याळाच्या लंबकासारखं आंदोलीत होत होतं.

“ किस्तं वाजलं वो दादा ? “

तिनं हातात घड्याळ असणाऱ्या एकाला विचारलं.

“ तीन वाजले..”

तीन वाजल्याचं ऐकून तिची पावलं स्टँडच्या दिशेने वळली. स्टॅण्डवर न जाता स्टँडच्या बाहेर असणाऱ्या झाडाखाली ती थांबली. तिला स्टँडवर आलेला जयसिंगही दिसणार होता आणि चारही लागलेली गाडीही. गावाकडनं येणाऱ्या जयसिंगला स्टँडवर जाण्यासाठी वळताना ती दिसणार होती. बराच वेळ ती उभा होती.. मनात आशा- निराशा लपंडाव खेळत होती.. लपंडावात कोण जिंकणार हे चारची गाडी आणि जयसिंग यात आधी कोण येईल त्यावर ठरणार होतं.

स्टँडवरची गावातली माणसं गाडीकडे जाऊ लागली तसं चारची गाडी फलाटावर लागत असल्याचं तिला समजलं.. तिच्या मनानं होकार-नकार काहीही स्वीकारण्याची तयारी केली असली तरी तिच्याही नकळत डोळ्यांत पाणी दाटून आलंच..तिने पदराने चेहरा पुसण्याचं निमित्त करत डोळे टिपले. मनाला समजावलं, सावरलं. नकारला तिने स्वतःशीच हसून स्वीकारले आणि पाटी उचलून गाडीत बसण्यासासाठी स्टँडवर जायला वळली.…

… आणि मागून हाक आली ‘ सुमा ‘

ती मागं वळली, फटफटी घेऊन जयसिंग उभा होता.

ती मटकन खालीच बसली आणि मनात दाटून आलेला निराशेचा उमाळा डोळ्यांतून बाहेर पडू लागला होता. ती तोंडावर पदर घेऊन डोळे टिपत स्वतःला सावरत होती.. जयसिंग तिच्या पाठीवर हात ठेऊन तिला म्हणाला,

“ उठ, चल जाऊया. “

*****

जयसिंगचे आबा सोप्यातल्या माचावर बसले होते..

“ येवडा कसला इचार करीत बसलायसा ? दोन-तीन डाव हाळी मारली तुमास्नी ।।”

जयसिंगच्या आईने सोप्यात येताच विचारलं.

“ पोराचं लगीन न्हाय आजून.. कसलं दिस आल्यात.. पोरीचं न्हाय म्हंत्यांत “

“ उगा काळजी करून काय हुतंय वी.. देवीच्या मनात आसंल तसं हुईल..”

“ कंची देवी ? “

“ अवो, आसं काय करतायसा… आपली डोंगराई.. तिच्या मनात आसंल तर कवा लगीन हुईल ती उमगायचं बी न्हाई..”

“ तसं झालं तरी चालंल.. पर पोराचं लगीन हूदे.. आई डोंगराई.. लेकरावर किरपा आसूदेल तुजी..”

जयसिंगच्या बापानं मावळतीकडे तोंड करून हात जोडले.

थोड्याच वेळात फटफटीवरून जयसिंग नी सुमन दारात दत्त झाले.. जयसिंगचा आबा अवाक झाला.

“ देवी पावली गं आमास्नी.. “

भाकरतुकडा त्यांच्यावरून ओवाळून टाकत जयसिंगची आई म्हणाली..

“ पळवून आणलीस ? “

“ पळवून कशापाय आणायची.. लगीन करून आलूय.. रजिस्टर..”

“ आरं पर..”

“ आता कायबी बोलू नगासा, चांगली धडूतं घाला.. तवर शिरा आणते.. त्वांड गोड करून , ईवाय पावण्याकडं जाऊन भेटून याचं हाय..”

“ म्हंजी तुला…”

“ समदं ठावं हुतं.. उठा आता..”

तासाभरात गाडी भिवाच्या दारात होती.. रंगातात्याही सांगावा गेला होताच.. ती नवरा -बायको दोघंही भिवाच्या घरात आली होती.. एवढं तातडीचे काय हे कुणालाच माहीत नव्हतं. गाडीतून नवरा- नवरीच्या वेशात जयसिंग, सुमी, मागनं ईवाय पावणा, ईन बाई असे सगळे आलेले पाहून सगळेच आवाक. भिवाला तर जोराचा धक्का बसला होता . सुमीच्या आईने पुढं होऊन त्यांच्यावरून भाकर तुकडा ओवाळून सर्वांना घरात घेतलं..

चहा-पाणी झाल्यावर ईवाय पावणा म्हणाला ,

“ औदाची सुगी लंय भारी झालिया .. पुरण-पोळीचा ब्येत हून जाऊदे..”

“ आवो पर…”

जयसिंगची आई नवऱ्याला म्हणाली..

“ ईन बाई, समदी तयारी हाय.. कराय घ्येत्ये..”

“ म्हंजी तुमास्नीबी …. ? “

“ व्हय..”

“ बरं पोरानु , देवाला जाऊन या हितं बी.. गाडीतनं जावा..”

“ नग.. तात्यांची फटफटी हाय की भायेर.. सुमीला फटफटीवनं तिचं म्हायेर दावून आणतो..तात्या किल्ली द्या..”

फटफटी गेल्याचा आवाज झाला..

“ कायबी म्हना पर पोरं लईच फास्ट.. ही मजाच न्यारी हाय बगा. आपल्या टायमाला आसं काय आस्तं तर फटफटीवनं पळवून आणून लगीन केलं आस्तं..”

कणिक तिम्बताना जोराचा आवाज झाला तसं सगळ्यानी तिकडे पाहिलं.. तात्यांच्या मालकिणीनं कणकेवर जोराचा गुद्दा मारला होता..

“ आगं तुज्यासंगतीच म्हंतुय मी..”

तात्या म्हणाले आणि आत-बाहेर जोराचा हशा पिकला.

समाप्त –  

© श्री आनंदहरी

इस्लामपूर जि. सांगली – मो  ८२७५१७८०९९

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ सुगी… भाग-२ ☆ श्री आनंदहरी ☆

श्री आनंदहरी

? जीवनरंग ?

 ☆ सुगी… भाग-२ ☆ श्री आनंदहरी 

 (बाईच्या जातीला डाग लावायला तिळाएव्हढं निमित्त पुरतं इथं तर हरभऱ्याएवढा डाग होता. वडाची साल पिंपळाला लावण्याच्या लोकांच्या वृत्तीमुळे सुमीचं लग्न नाही झालं तर रमीचं लग्न ठरण्यात अनंत अडचणी येणार होत्या हे त्याला जाणवत होतं. हीच काळजी त्याला रात्रंदिवस खात होती. कुठंही असला तरी तो आपल्याच विचारात असायचा. बायकोने कितीदा तरी त्याला सांगण्याचा, समजवण्याचा प्रयत्न केला तरी त्याच्यात फरक पडला नव्हता.. त्या बिचारीला ती आणखी एक काळजी लागलेली होतीच.) – – इथून पुढे — 

“आबा, तुमास्नी रंगातात्यांनी बोलीवलंय… लगुलग.. ”

डेरीला दूध घालून आलेली सुमी घरात शिरता शिरता गोठ्याच्या सपरात खाटेवर बसलेल्या भिवाला म्हणाली. विचाराच्या तंद्रीत असलेल्या भिवाच्या कानापर्यंत आपला आवाज गेलेला नाही हे सुमीला जाणवलं.. आपल्या काळीजमुळे वडिलांची ही स्थिती असते हे तिला माहीत होते. तिला त्याचं खूप वाईट वाटायचं.. त्या क्षणीही तिचे डोळे पाणावले. पापण्यांच्या काठावर दाटलेले पाणी झटकन पुसत ती सपरात गेली.

“ आबा, तुमास्नी रंगातात्यांनी लगूलग बोलीवलंय.. ”

“हां ss हां !”

विचारातून भानावर येत भिवा म्हणाला.

“ जावा मग…”

“ कुणिकडं.. ?”

“ अवो, सांगितलं न्हवं, रंगातात्यांनी बोलीवलंय ती.. ”

“ मला.. ? “

“ मंग कुणाला.. ? तुमास्नीच.. जावा लगूलग.. ”

“ कशापायी.. ? “

“ ती मला काय ठावं ? उठा, जावा लगूलग.. ”

भिवा उठला, घरात शिरून त्याने खुंटीवरली टोपी अन टॉवेल घेतला. टॉवेल खांद्यावर टाकत स्वतःशीच पुटपुटल्यासारखा बायकोला म्हणाला,

“ कशापायी बोलीवलं आसंल तात्यांनी ? “

“ थांबा वाईच, मी जात्ये आन ईचारून येत्ये.. ”

हसत हसत बायको म्हणाली.

‘बायकाच्या जातीला काळजात काटं खुपत आसलं तरी व्हटावर हासू ठेवाय लागतं.. ‘ आईच्या चेहऱ्यावरचे हसू पाहून सुमीला कधीतरी आई म्हणालेली वाक्य आठवलं. ती नकळत आईच्या चेहऱ्याकडं पहातच राहिली.

‘ तसं नव्हे गं.. ’ म्हणत भिवा बाहेर पडला.

थोड्यावेळाने भिवा परतला तसे बायकोने उत्सुकतेने विचारलं. ,

“ कशापाय बोलीवलंवतं तात्यांनी ? “

“ त्यी शेवतंकराचं रान न्हाय का त्येंच्या इवायपावण्यांनं घेतल्यालं.. ती वाट्यानं कर म्हणीत हुतं. तुज्या सवंवलं हाय. त्येवडं कर. “

“ मंग.. ? “

“ आगं, आपल्या आडीनडीला तात्या कवाबी हुबं अस्त्यात.. न्हाय कसं म्हणायचं.. घरात ईचारून बघतो म्हणलं. “

“ न्हाय कशापाय म्हंतायसा.. ? सवंवलं रान हाय.. करूया वाट्यानं… पर आसं आदी-मदीच ?

“ आगं, ह्येवार मागल्या म्हैन्यात झाला न्हवंका.. ! तवापास्नं पाऊस तुटलाय वी.. औंदा गहू-हरबरा कर म्हणलं. “

“ मंग लगोलग व्हय म्हणायचं न्हाय व्हय ?”

“ आगं पर तुला ईचाराय नगं.. ? “

“ आजपातूर सम्दं काय ईचारूनच केलंयसा व्हय ? “

भिवानं चमकून इकडं-तिकडं, बायकोकडं पाहिले. सुमी, रमी तिथं न्हवत्या. बायकोने त्याच्याकडे तिरप्या नजरेने पहात फुकणी घेऊन चुलीतल्या इस्तवावर फुंकर मारली तसा भकदिशी जाळ झाला.. लाकूड पेटलं…

भिवानं रंगातात्यांना होकार दिला होता. त्यांच्या ईवाय पावण्याचं रान अर्ध्या वाट्यानं करायचं म्हणजे तसं त्रासाचेच होतं. दोन वर्षे रान पडीक होतं. त्यामुळं तण तण मायंदळ माजलवतं. पण एक बरं होतं, पावण्याचा ट्रॅक्टर होता.. तात्यांच्या जावयाचा धाकला भाऊ, जयसिंग शेतीत होता. भादव्याच्या उन्हानं कडाका दिला तसा तो ट्रॅक्टर घेऊन आला.. मशागतीचं दिस नसलं तरी त्यानं रान उभं-आडवे नांगरून दिलं. आणि तात्यांच्या दारात ट्रॅकटर ठेवून माघारी वळला.. त्या रानासाठनं चार-आठ दिस पाऊस लागला नाही तर बरं होईल असं भिवाला वाटत होतं. तसंच झालं. आठ दिवसांनी ट्रॅक्टरनं रान कुळवायला जुपी केली. नांगरानं निघालेलं तण भसासा मोकळं व्हायला लागलं. कुळवामागं भिवा, त्याची बायको आणि सुमी तण गोळा करत होते.. बांदावर ढीग टाकत होते.. सुमीला बघितल्यापास्नं पावण्याची चोरटी नजर सुमीकडं सारखी वळत होती. तो ट्रॅकटर चालवताना कधी आरशातनं, कधी तिरक्या नजरेने सुमीला न्याहाळत होता. तिचे देखणेपण, तिच्या कामाचा झपाटा त्याला भावला होता.

दिवसात सगळे रान कुळवून झालं होतं. तणाचा ढीग बांदावर पडला होता.

“ मामी, बसा, सोडतो घरला. “

“ नगं, आमी वाईच ऱ्हायल्यालं तन गोळा करून येतो.. तुम्ही व्हा म्होरं, तुमास्नी वखुत हुईल जाया.. ”

“ ए, तू न सुमी जावा घरला.. मी येतो उरकून. “

भिवा म्हणाला तशी त्या दोघीजणी ट्रॅक्टरवर बसल्या. पावण्यांनं दाराम्होरं ट्रॅकटर उभा केला.

“ वाईच च्या घेऊन जावा.. ” सुमीची आई उतरता उतरता म्हणाली.

“ नगं, तात्यांकडं जाऊन जायाचं हाय, लगूलग.. ”

“ जाशीला की.. फटफटीवनं तर जायाचं आसतंय.. ”

“ खरंच उशीर हुईल.. ”

“ आगं आये, आपला गुळाचा च्या गुळमाट लागत नसंल त्यास्नी. ” सुमी त्याच्याकडं तिरक्या नजरेने पहात म्हणाली. तो काहीसा गडबडला

“ बरं मामी, तुमी येवडं म्हंतायसा तर ठेवा पटदिशी.. ”

तो सुमीकडं बघत, मामी शब्दावर जोर देत म्हणाला.

त्यानं ट्रॅक्टर बाजूला घेऊन बंद केला.

चहा घेतानाही, सुमीच्या आईबरोबर बोलतानाही त्याची नजर अधूनमधून सुमीकडेच वळत होती.. घरात आल्यावर सुमीचं हिकडचे -तिकडचे काम सुरू होतंच. चहा पिऊन बाहेर पडल्यावर.. काहीतरी आठवल्यासारखा माघारी वळला. चौकटीवर दोन हात ठेवून तोंड आत करत सोप्यातल्या सुमकडे बघत त्याने जराशा मोठ्या आवाजात सुमीच्या आईला सांगितलं,

“ मामी, मामास्नी सांगा आठ-धा दिसात सवडीन ईन.. “

“ बरं, सांगत्ये आबास्नी.. या सवडीनं. “

मामीच्या ऐवजी सुमीनंच त्याच्याकडं बघत उत्तर दिलं. सुमी पहिल्यांदाच त्याच्याशी बोलली होती. गडी मनात सुखावला. रेंगाळतच ट्रॅक्टर जवळ गेला. काहीशा अपेक्षेने वळून दाराकडे पाहिलं. सुमी दारात, अंगणात नव्हती.. पण ‘या सवडीने ‘ वाक्य आठवून खुषीतच ट्रॅकटर चालू करून तो निघून गेला.

हरभऱ्याला पीक चांगलंच आलं होतं. जयसिंगची, रंगातात्यांच्या पाहुण्याची आठ-दहा दिवसांनी फेरी असायचीच. सुरवातीला काहीतरी निमित्त काढून सुमीशी बोलणारा जयसिंग संधी मिळाली की काहीतरी बोलत होता. संधी शोधत होता. सुमी काहीसं अंतर राखून पण मोकळेपणाने आपल्याशी बोलतेय हे त्याला जाणवत होतं. तिच्या मनाचा अंदाज लागत नव्हता.

घरी जमीन-जुमला, बागायची शेती होती, दारात ट्रॅक्टर, चारचाकी, दोनतीन फटफटी होत्या. तसे तालेवार घर होतं तरीही गेली चार वर्षे लग्न जमत नव्हतं. शेतकरी आहे म्हणल्यावर पोरीचं नव्हे तर त्यांच्या घरचे काही बघायच्या आधीच नकार देत होते. गावा-खेड्यातल्या रीती-रिवाजानुसार त्याचं लग्नाचे वय उलटून चाललं होतं. ही एकट्या जयसिंगची समस्या नव्हती तर शेतकऱ्यांची, शेती करणाऱ्या पोरांची लग्नच होत नव्हती. मुलींच्या अपेक्षा वाढल्या होत्या. त्यांना शहराची ओढ होती.. नोकरदार हवा होता.. त्याच्या दस पटीने मिळवणारा शेतकरी नको होता.

सुमीला रानात काम करताना पाहिली तेंव्हापासून त्याला ती आवडली होती.. तिच्याशी लग्न करून संसार करण्याची स्वप्नं तो पहात होता. पण अनेक नकार पाहिलेल्या जयसिंगला त्याबाबत तिच्याशी बोलण्याचे, आपलं मन तिच्यापाशी मोकळे करण्याचं धाडस झालं नव्हतं.. ती त्याच्याशी मोकळेपणाने बोलत होती, चेष्टा -मस्करी करत होती. त्याने केलेल्या मस्करीका लाजून, हसून दाद देत होती पण त्यावरून काही अंदाज बांधता येत नव्हता.. एखाद्याचा तसा मोकळा स्वभाव असतो हे जयसिंग जाणून होता. तरीही मनात खळबळ माजली होती. मन सुमीसाठी हुरहूरत होतं. तिचा होकार असो वा नकार.. पण त्याला तिच्याशी बोलायचं होतं, मन मोकळं करायचं होतं… पण बोलण्यासाठी ती एकटी अशी भेटतच नव्हती..

सुमी आणि तिची आई रानात काम करत होत्या. भिवा तालुक्याला गेला होता.. दिवस मावळत आला तशी सुमीची आई तिला म्हणाली,

“ ऱ्हाउदे, ऱ्हायल्यालं बघू उद्याच्याला.. ह्येनीबी न्हायती.. धारा काडाय पायजेत.. चल जाऊया. “

“ तू हो म्होरं, येवडी कड लावून येत्ये. “

“ लय वखुत करू नगो.. ”

“ न्हाय, आल्येच मागनं.. ”

वर खोपीजवळ आल्यावर त्या जयसिंगला म्हणाल्या,

“ मी जात्ये म्होरं.. धारा -बिरा काडायच्या हायती.. सुमी हाय. तुमी या च्या प्याला. “

जयसिंग ‘बरं ! ‘ म्हणाला. सुमीची आई ग्येली तसं त्याचं मन हारखून टूम झालं होतं.. सुमी एकटी होती.. तिच्याशी बोलता येणार होतं. मन मोकळं करता येणार होतं… तो तडक हरभऱ्याच्या वावरात गेला.

“ सुमा ss !”

कामात गर्क असणारी सुमी दचकली अन पटकन मागे वळली. जयसिंगला पाहताच धिरावली.

“ तुमी हायसा व्हय.. ”

“ मला तुज्यासंगं वाईच बोलायचं हाय.. ”

“ हूं.. ”

“ मनातलं बोलतूय.. राग मानू नगं.. ईचार करून काय ते सांग.. तरीबी न्हाईच पटलं तर हितलं हितंच सोडून दे.. ”

“ हूं.. ”

जयसिंगने सगळा धीर गोळा केला आणि पटकन म्हणाला,

“ सुमा, लगीन करशील माज्यासंगं ? मला तू लै आवडतीस. “

सुमाला तो काय बोलणार याचा अंदाज होता. तरीही ती लाजली, गप्प झाली.

“ गप का झालीस ? “

जयसिंग मनातून जरासा खट्टू झाला होता. तिनं जयसिंगकडं पाहिलं. त्याच्या मनातली निराशा चेहऱ्यावर पावसाचं पाणी ओघळावं तशी ओघळली होती..

“ लय भोळं हायसा तुमी.. आसं लगीच खट्टू कशापायी हुतायसा.. मी न्हाय कवा म्हणलंय.. ? “

जयसिंगचा चेहरा खुलला.

“ आसं, लग्नाचं ईचारल्याव लगीच बोलता येतं व्हय पोरीस्नी.. तुमचं मन मी कवच वळखलं हुतं… तुमी चांगलं हायसा, मलाबी तुमांगतच वाटतं पर तुमाला काय बी ठावं न्हाय.. ”

“ तुला वाटतंय न्हवं का ? मग बास झालं, बाकी मला काय ठावं करून घ्याचं न्हाय. “

“ पर मला बोलायचं हाय.. तवर माज्यासंगं जी बोललाय ती मनात ठ्येवा.. कुणालाबी बोलू नगासा.. माजी आण हाय तुमास्नी.. ”

“ सुमा, आत्ता बोल की काय हाय ती.. काय बी आसलं तरीबी मला तुज्यासंगंच लगीन करायचं हाय.. ”

पुढं होऊन सुमीचा हात हातात घेत म्हणाला. हात सोडवून घ्यायचा प्रयत्न न करता त्याच्या डोळ्यांत पहात हसत सुमी म्हणाली,

“ धीर धरवना व्हय हो.. पर धीर धराय पायजेल. उद्या मी माळवं तोडाय येरवाळी आमच्या रानात जाणार हाय.. येकलीच.. तवा सांगत्ये. “

जयसिंग सुखावला..

“ आतातरी सोडा हात.. का.. ?”

काहीसं लाजून हसत सुमा म्हणाली. तसे भांबावून जयसिंग नुसताच ‘अं ss !” म्हणाला…तसे सुमीने नजरेनेच त्याने धरलेल्या तिच्या हाताकडं इशारा केला.. जयसिंगने गडबडून हात सोडला.

“ चला, तुमच्या लाडक्या मामीनं तुमाला च्या प्याला बोलीवलंय न्हवंका.. ”

“ लाडक्या ? “

जयसिंगने मिश्कीलपणे तिच्याकडे पहात विचारलं..

“ न्हाय व्हय ? मला आपलं वाटलं.. नसंल तर ऱ्हाऊदेल.. ”

सुमा त्याच्या डोळ्यांत पहात म्हणाली.. तो गडबडला. ते पाहून हसत म्हणाली,

“ सजागती गंमत केली तुमची. चला, आय वाट बगीत आसंल.. ”

— क्रमशः भाग दुसरा

© श्री आनंदहरी

इस्लामपूर जि. सांगली – मो  ८२७५१७८०९९

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ सुगी… भाग-१ ☆ श्री आनंदहरी ☆

श्री आनंदहरी

? जीवनरंग ?

 ☆ सुगी… भाग-१ ☆ श्री आनंदहरी 

रानात पावसानं पार रेंदा केलावता.. आषाढ संपला तरी पाऊस थांबायचं काही नाव घेत नव्हता. चार चार दिवस सूर्य दिसत नव्हता.. भिकाजी सोप्यात बसला होता. सोप्यात बसून बसून कंटाळला होता.. असे घरात बसून राहणं त्याच्या स्वभावात नव्हतं. काम असो वा नसो रानात फेरफटका मारायचा रानातल्या खोपीत जायचं. मावळतीलाच घरला परतायचं.. घरला आलं की बैलांपुढे वैरण टाकायची, म्हसरांसमोर भरडयाची पाटी सरकवायची. म्हशींनी फुsस फूsस करत भरडा खायला जुपी केली की उकिडवे बसून धार काढायची.. रेडकू सोडून म्हस पानावली की कासांडीतल्या पाण्याचा शिपकारा मारून आधी सगळी कास अन मग एकेक थान स्वच्छ धुवून घ्यायचं. दुमडलेला अंगठा आणि वळवलेल्या चार बोटात धरून एकेका थानातनं दुधाची धार तांब्यात घ्यायची. तांब्या भरला की कासांडीत ओतायचा.. तीन थानं पिळून झाली की मेढीला बांधून ठेवलेलं रेडकू सोडायचं. कासांडी किटलीत ओतायची की मग दुसऱ्या म्हशीची धार..

धारा काडून झाल्या की किटलीतलं थोडे दूध घरात ठेवून राहिलेलं दूध डेरीत घालायला. भिवा गावात जायचा. तिथं कोणतरी भेटायचं, बिडी बहाद्दर असला तर बिडी फुडं करायचा.. किंवा ‘ काड बिडी.. ’ म्हणायचा. भिवाजीला फक्त बिडीचा नाद.. मग बिडीचं झुरकं मारत पारभर हिकडल्या-तिकडल्या गोष्टी व्हायच्या.. त्याचा रोजचा हा नेम होता पण पाचसहा महिन्यापासून त्याने स्वतः गावातल्या डेरीत जायचंच बंद केलं होतं. सुमी नाहीतर धाकली रमी दूध घालायला जात होत्या.

धारा काडून कासांड्या सुमीला हाळी मारून तिच्या हातात दिल्या आन गोठ्यातल्या माचावर भितीला पाठ टेकवून बसत भिवानं कोपरीच्या खिशातनं बिडीबंडल आन काडीपेटी काढली. बिडी पेटवून झुरका घेतला आन त्याला किटली घेऊन डेरीत निघालेली पाठमोरी सुमी दिसली.. त्याच्या मनात तिच्याबद्दलच्या काळजीचा धूर दाटू लागला. ‘कसं हुयाचं पोरीचं? ‘ या प्रश्नाची वलयं विरळ होत जाण्याऐवजी दाट होत मनाला अस्वस्थ करू लागली.

सुमीचं लग्नाचं वय झाले तसं पावनं बगाय याला लागलंवतं. सुमी गोरीपान, देखणी.. कुणालापण आवडावी अशी होती. त्यामुळे तिच्या लग्नाची काळजी अशी त्याला कधी वाटली नव्हती. गावातले, पावण्या-पैतले कुणाला तरी स्थळ सुचवायचे, पावण्यांना बगायला घेऊन यायचे.. दोन-तीन स्थळं आली पण जुळले नाही.. कधी एक नाड आली तर कधी आणखी काही. लांबचा पण जाणं -येणं असणारा पावणा एक स्थळ घेऊन आला.. पोरगं-घरदार चांगलं होतं. सगळ्यांना आवडलं. द्या-घ्यायचं बोलणं झालं. ‘ याद्या कराय येतो ‘ म्हणून पावणं माघारी गेलं. भिवा, सगळं घर खुशीत होतं.

सगळ्या गावात बातमी पसरली.

याद्याचा दिवस उजाडला. घरात सगळ्यांची तारांबळा उडाली होती. लग्न ठरल्यातच जमा होतं. याद्या फक्त रीत म्हणून लिहायच्या होत्या. पावण्याकडची पंधरा-वीस जणं आन भावकीतली, घरची तेवडीच.. शिरा-भाताचा बेत केला होता. भावकीतल्या चारजणी मदतीला आल्या होत्या. पावखाणं आलं तेव्हा जेवायची येळ झालीवती.

“ पावणं, संमदं ठरल्यालंच हाय, निस्तं कागदाव उतरायचं हाय.. मंग मी म्हंतो जेवाय येळ कशापायी करायचा..? आगुदर दोन घास खाऊन घेऊया आन मग करू की याद्या.. कसं? “ भिवाचा चुलत भाऊ, भावकीतल्या सगळ्या लग्नांतला कारभारी मध्यस्थाला म्हणाला. माध्यस्थानं पोराच्या बापाला विचारलं.. होकार आला तशी जेवणं झाली.

पावण्यांनी याद्याचा म्हौरत काडून आणलावता.. त्याला वेळ होता. शिळोप्याच्या गप्पा सुरू झाल्या. बिडी-तंबाखूची देवाणघेवाण सुरू झाली. पोराची बहीण सुमीला म्हणाली ‘ चल, ’ सुमीला काही समजेना. पोराची बहीण सुमीपरास थोरली.. दोनतीन सालामागं लग्न झालेली.

“ चल, पड्याल चुलत्याचं घर हाय न्हवं.. जाऊया.. ”

मदघरात बसलेली ती पावणी सुमीला म्हणाली आणि पिशवी घेऊन, सुमीच्या आईला ‘ पल्याडनं येतोच ‘म्हणत मागच्या दारानं बाहेर पडली. नवऱ्याचीच बहीण म्हणल्यावर कशाला काय विचारायचं? असा विचार करून सुमीच्या आईनं हसून मान डोलावली.

सुमीला काही समजलं नव्हतं तरीही ती पावणीसोबत गेली. चुलत्याचा घराला कडी होती ती काडून दोघी आत गेल्या.

“ दादाला तुला नऊवारी लुगड्यात बगायचं हाय.. ह्ये नऊवारी लुगडं दिलंय त्येनं.. तुज्यासाठनं खास ‘’

हातातल्या पिशवीतनं जांभळ्या रंगाचं नऊवारी लुगडं काढत पावणी हसत म्हणाली.

सुमी लाजली.

“ आगं बग तरी.. पास न्हाय का तुला..? ”

सुमी गडबडली..

“ पास हाय मला.. ”

“ लुगडं का दादा “

पावणीने मस्करी केली. सुमी लाजून चुर झाली.

“ आगं, वर बग तरी.. का दादाला सोडून कुणाला बगायचं बी न्हाय? “

“ ताईसाब …”

“ बरं, नेस ही.. ”

“ पर ताईसाब, मी कवा नेसलं न्हाई नऊवारी “

“ मी हाय की.. ”

नऊ वारी नेसवताना पावणी मध्येच थांबली.

“ वाईच थांब.. आलेच. ”

दार ओढून घेऊन पावणी थेट सोप्याकडं आली. तिने सोप्यात बसलेल्या भावाला खुणेने बाहेर बोलावले. त्याच्या कानात खुसफूसली. नवऱ्या मुलाने बापाला बोलावून काहीतरी सांगितले. बापाने मध्यस्थाला आणि मध्यस्थानं सुमीच्या चुलत्याला सांगितलं. पावण्याकडच्या बायकातही कुजबुज सुरु झाली.. सुमीची आईनं चुलतीला नजरेनेच खुणावलं अन पळतच पलीकडे गेली. पावणी लुगडं नेसवता नेसवता मध्येच बाहेर कशासाठी गेली हे न उमजून सुमी गोंधळून गेली होती..

“ काय झालं गं? “

आत जाता जाता सुमीच्या आईने विचारलं..

“ त्येनी नऊवारी लुगडं आणलंया.. ताईसाब ती नेसवत हुत्या.. मदीच भायेर गेल्यात.. ती आजूनबी आल्या न्हायती.. ”

“ बरं, तू ये लगुलग.. ”

आई परत येईपर्यंत पावणे उठून निघालेवते.

“ पोरीच्या अंगाव पांढरा डाग हाय.. तुमी फसवलंसा. आगुदर सांगितलं आस्तं तर आमी आलोच नस्तो. “

सुमीचं लग्न ठरल्याचा आनंद क्षणात मावळला होता.

“ आर, भाव हाय मी तुजा, मला तरी सांगायचं हुतंस.. ” कारभारी भाऊ भिवाला म्हणाला

“ मला का बोल्ली न्हाईस? ” भिवा बायकोवर चिडला.

“ सुमे, मला का दावला न्हाईस डाग? ”

सुमीची आई सुमीवर चिडली.

“ कंचा डाग? “

पाहुणे लग्न मोडून गेलं हे समजल्यावर सुन्न झालेल्या, रडू आलेल्या सुमीने विचारले..

सुमीच्या कमरेच्या जरा खालच्या बाजूला हरभऱ्यापेक्षा लहान पांढरा डाग होता पण सुमीच्याही तो लक्षात आला नव्हता. झाल्या प्रकारानं सारे घर सुतकात असल्यासारखं सुन्न होतं. सुमीच नव्हे तर भिकाजी सुद्धा कोलमडून पडला होता..

सुमीचं लग्न मोडलं हे साऱ्या गावभर झालं होतं.

कुठं कुणी भेटला की पहिले सुमीचं लग्न मोडल्याबद्दल विचारायचा.. त्या विचारण्यात आपलेपणा, सहवेदना किंवा काळजी नसायचीच. , दुसऱ्याच्या जखमेवरच्या खपल्या काढण्यात लोकांना काय आनंद मिळतो.. कुणास ठाऊक?

भिकाजी या साऱ्याला त्रासला होता. त्यांन रानाची वाट धरली होती.

सुमीच्या आईने सुमीची समजूत घातली.. तिला धक्क्यातून सावरली होती.. काळ हेंच सगळ्यावरचं औषध असतं,.. निदान बाह्यांगी तरी सुमी सावरली होती. पण भिवाजी मात्र गावात जायचं थांबला होता ते थांबलाच होता..

त्याला सुमीचं लग्न मोडल्याचे दुःख होतेच पण त्याहीपेक्षा जास्त ‘ सुमीच्या आयुष्याची काळजी जास्त होती. त्या विचाराने मन भिरभिरत होतं..

बाईच्या जातीला डाग लावायला तिळाएव्हढं निमित्त पुरतं इथं तर हरभऱ्याएवढा डाग होता. वडाची साल पिंपळाला लावण्याच्या लोकांच्या वृत्तीमुळे सुमीचं लग्न नाही झालं तर रमीचं लग्न ठरण्यात अनंत अडचणी येणार होत्या हे त्याला जाणवत होतं. हीच काळजी त्याला रात्रंदिवस खात होती. कुठंही असला तरी तो आपल्याच विचारात असायचा. बायकोने कितीदा तरी त्याला सांगण्याचा, समजवण्याचा प्रयत्न केला तरी त्याच्यात फरक पडला नव्हता.. त्या बिचारीला ती आणखी एक काळजी लागलेली होतीच.

– क्रमशः भाग पहिला

© श्री आनंदहरी

इस्लामपूर जि. सांगली – मो  ८२७५१७८०९९

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ भेटला विठ्ठल ☆ सुश्री स्वप्ना मुळे (मायी) ☆

सुश्री स्वप्ना मुळे (मायी)

? जीवनरंग ?

☆ भेटला विठ्ठल ☆ सुश्री स्वप्ना मुळे (मायी)

“हो या तुम्ही नक्की,.. मला निरोप मिळालाय जोशींकडून, वारीला जाणाऱ्या चार महिलांची सोय करायची आहे म्हणून,.. तुमच्या ओळखीच इथं कोणी नाही म्हणून संकोच करू नका,.. या आपलंच घर समजून,.. दोन तासांचा तर प्रश्न आहे हो,.. मी एकटीच राहते,.. या तुम्ही पत्ता पाठवलाय तुम्हाला व्हाट्सएप वर एवढं बोलत त्या आजींनी फोन ठेवला….”

“आजीच असाव्यात” असं मनात निशा म्हणाली,… पण अजूनही हॉस्पिटलमध्ये काम करतात म्हणजे असेल मावशी किंवा काकूच्या वयाची असंही डोक्यात आलं,.. आवाज जरा थकलेला होता पण वपुच्या स्वर कथेची आठवण झाली लगेच आताच नको फोनवरून ठरवायला आजी का मावशी ते असं म्हणत मनातला विचार झटकत ती तयारीला लागली,..

नेहमी प्रवासाला भरतो तशी बॅग भरायची नाही हे आजीने सांगून झालंच होतं,.. “अग निशा वारी काय पसारे घेऊन यायला नाही शिकवत,.. वारी त्या विठ्ठलाच्या नामाचा पसारा मनात भरायला शिकवते,.. वारी सगळं सुख म्हणजे त्याच नाम मुखात घेऊन चालायला शिकवते,.. वारी माणसातला माणूस ओळखायला शिकवते,.. आपलं हे भौतिक विश्व नाही भरायचं हं गाठोड्यात,.. लागतात म्हणून दोन वस्त्र बस,.. बाकी तुमचे चोचले तिथे नको. ” असं गेल्या पंचवीस वर्षे वारी करणाऱ्या आपल्या सखू आजीने ठणकावले होतेच ते सगळं आठवून तिने कमीत कमी सामान घेतलं,.. आता फोन केलेल्या बाईकडे उद्या एक दिवस उतरून फ्रेश होऊन,.. पुढं वारीत मिसळून जायचं होतं,.. फक्त हा एक दिवस कोणी ओळखीच आहे का पाहावं म्हंटल तर, आपली आत्या, त्या मंत्रिणींचे नातेवाईक नाहीच म्हंटल पण शाळेतल्या जोशींनी ह्या बाईचा नंबर दिला,.. तेंव्हा सखू आजीच वाक्य आठवलं, “वारी म्हणजे माणसांमाणसातून भेटणारा विठ्ठल,.. “तश्याच ह्या बाई असाव्या,.. हे सगळं मनात सुरू असताना तिला वाटलं आपण त्यांच्याकडे जाणार आपली ओळखपाळख नसताना तर काहीतरी न्यायला हवं त्यांना पण काय न्यावं हा विचार करत ती देवाजवळ दिवा लावण्यास वाकली आणि तिला एकदम सुचलं दिवा,.. दिवाच न्यावा का,..? तिने पटकन मागच्यावर्षी वास्तुशांतीत आलेल्या गिफ्टचं पोत उघडलं,.. नवऱ्याने सगळे गिफ्ट बांधून ठेवले होते,.. आहे तो पसारा पुरे म्हणत,.. मग असं कोणाला काही द्यायचं असलं की पोत उघडलं जायचं,.. आताही पोत्यातला तिला तो लाईटचा दिवा सापडला,.. सुंदर नक्षीकाम केलेला,.. जुन्या पितळीदिव्यांसारखा पण एक गोष्ट नवी होती त्यात,.. वात दिसत होती पण ती न लावताही पेटवलेली,.. त्याची बारीक लाईट सिस्टीमच खुप छान होती,.. त्या दिव्याला मस्त जाड साखळी होती कारण तो जुन्या घडणीसारखा आधुनिक लामणं दिवा होता देवघरात लावला तर बरोबर मूर्तीचा चेहरा उजळून निघायचा,.. आपल्या माहेरी होता असा आपल्याला खुप आवडायचा म्हणून आत्याने मुद्दाम हा गिफ्ट दिला पण थोडा मॉडर्न आहे ग बाई लाईटच्या वातीचा,.. तुझ्या बंगल्याला शोभेल असा तेलवातीची गडबड नको म्हणून तिने हा दिवा दिला होता,.. एक क्षण वाटलं तिला हा नको द्यायला म्हणूज बाकी गिफ्ट थोडे चाळले,.. कुठे बरण्याचे सेट, कुठे डायनिंग कव्हर, फ्लॉवर पॉट, नाईट लॅम्प असे गिफ्ट होते पण शेवटी हाच म्हणत तिने तो बॅगेकडे आणला,..

सगळी तयारी झाली, चार मैत्रिणी घेऊन ती निघाली,.. सगळ्या कुजबुजत होत्या, ” अनोळख्या घरी जायचं कसं,..? “पण जसं जस गाव जवळ आलं तसं त्या बाईचे फोनवर फोन या चुकू नका,.. रिकश्यात बसल्या की मला बोलायला द्या,.. रिक्षावाल्याला त्या स्वतः बोलल्या आणि रिक्षाने त्यांच्या दाराशीच नेऊन सोडलं,.. तसं दरवाज्यातून अगदी हसरा चेहरा असलेल्या बाई म्हणाल्या,.. “या या वाटच बघत होते,..

आले वारकरी दारी, होईल दिवाळी साजरी,.. “

सगळ्याजणी उतरून आत गेल्या,.. मावशींनी पाणी आणलं आणि तिथेच बसल्या,.. हो मावशीच्या वयाच्या होत्या त्या,…. काही गप्पा झाल्या आणि मावशी उठल्या तेवढ्यात निशाची बॅग पायाला लागून त्या जरा पडायला आल्या,.. चटकन म्हणाल्या, “माफ करा हं चहा करायला उठले पण रोजच्या जीवनात ह्या बॅगाची सवय नाही ना,.. ह्याला जरा पलीकडे ठेवता का,..? “आणि त्या वाकून बॅग चाचपडू लागल्या,.. सगळ्यांना धक्काच बसला मावशी अंध होत्या,.. तरीपण ती छोटी खोली अगदी टापटीप होती,.. त्या अजूनही हॉस्पिटलमध्ये काम करत होत्या,.. आपल्या सारखी चार अनोळखी माणसं त्या प्रेमाने बोलवत होत्या,.. निशाला आश्चर्य वाटलं,.. ती पटकन म्हणाली देखील, ” माफ करा हं,.. आम्हाला माहीत नव्हतं तुम्हाला दिसत नाही,.. आमच्यामुळे उगीच तुम्हाला त्रास,.. “त्यावर मावशी हसून म्हणाल्या, “अग त्रास कसला,.. गेली कित्येक वर्षे एकटी राहाते, ह्या डॉक्टरने विठ्ठल बनून आश्रय दिलाय,.. मी आणि नवरा वारी चुकवत नव्हतो,.. एका वारीत अपघात झाला,.. ते गेले आणि माझी दृष्टी गेली,.. तिथल्या कॅम्पमध्ये हा डॉक्टर सेवा द्यायला आला होता,.. मला मुलबाळ नाही म्हंटल्यावर मला त्याने आश्रय दिला,.. सगळा दवाखाना मी सांभाळते म्हणजे माझा विठोबा बघतो इथे राहून,… डॉक्टर इथून दहा मिनटाच्या अंतरावर राहतात,.. गेटवर एक वॉचमन आहे,.. आणि इथे माझा हा पाठीराखा म्हणत त्यांनी कोनाड्याकडे हात केला,.. काळ्याभोर दगडातील सुंदर विठ्ठल मूर्ती तिथे उभी होती मंद हास्य करत,.. तिला तुळशीची माळ घातलेली होती,.. सगळ्याजणी मूर्ती पाहात असताना मावशी म्हणाल्या, “तुम्ही आवरा तुमचं मी चहा करते म्हणत कपाटाच्या मागे त्या गेल्या,.. निशाने तिथे डोकावलं तर टेबलावर गॅस होता चहाची सगळी तयारी केलेली होती,..

मावशी एकदम म्हणाल्या, “निशा, एवढा गॅस पेटवून दे, आज माझी फरशीवाली मुलगी आली नाही ए, रोज ती असली की गॅसजवळची काम आटपून घेते,.. डॉक्टरने तसं तिला सांगून ठेवलं आहे,.. ती आली नाही की मी डबा मागवून जेवते पण ती नसली की एक मोठं काम अडून जातं माझं माझ्या विठुला अंधारात बसावं लागतं ग,.. “त्यांच्या ह्या वाक्यावर निशाने एकदम विठू कडे बघितलं आणि तिला विठू मघापेक्षा आता वेगळाच हसताना दिसला,.. तेवढ्यात एक मैत्रीण मावशीला धरून बसवत म्हणाली,.. “आज आराम करा तुम्ही, आम्ही लेकीच तुमच्या तुमच्याकडे हक्काने आलो,.. आम्ही उद्या गेलो की परत तुम्ही तुमची काम करा,.. “मावशीने विठ्ठलाच्या मूर्तीकडे बघत हात जोडले,.. बरा भेटलास रे ह्या पोरींमधून तू आज,..

चहा, अंघोळी, जेवण आटोपली,.. त्या छोट्याश्या खोलीत कोनाड्यात तो उभा आणि खाली ह्या पाचजणी पहुडलेल्या,.. पलंगावर मावशी बसून वारीच्या आठवणी सांगण्यात रमली होती,.. निशाला वाटलं किती अनोळखी आहे ही मावशी आपल्या सगळ्यांना,.. पण तरीही किती आपलेपणाने तिने आपल्याला ह्या छोट्या खोलीत मोठं मन करून जागा दिली आहे,.. खरंतर ह्या चौघींपैकी दोघींच्या ओळखिच्यांनी आम्हीच बाहेरगावी जाणार आहोत हे सांगून हात झटकले,.. आपल्याही त्या दूरच्या आत्याला आपण विचारलं तर म्हणाली, “एकटी असती तर जमलं असतं ग,.. एवढ्याना नाही जमणार,.. खोल्या चारच आहेत ना,.. किती वेगवेगळी कारणं,.. पण ह्या मावशीशी कुठले हे ऋणानुबंध ह्या विचाराने निशाचे डोळे भरून आले,.. ती उठून मावशीजवळ गेली,.. त्यांचा हात हाती घेत म्हणाली, “मावशी तुम्ही एवढी वर्ष वारी केली,.. पण विठुने तुम्हाला अंध केलं, जोडीदार हरवला,.. मग तरी त्याची मूर्ती ठेवून परत सगळं श्रेय त्याला का,..? “

मावशी म्हणाली, “निशा वारी म्हणजे फक्त चालणं नसतं,.. चालताना माणसाचं माणसाशी जगणं असतं,.. एकमेकांना धरून पुढे नेणं आणि जाणं असतं,.. आयुष्यात घटना घडल्या म्हणजे त्याला दोष देऊन त्याच्याशी नातं तोडून कसं चालेल,.. अग तोच तर माणसातला देव दाखवायला बसलाय,.. डॉक्टरांनी येऊन क्षणात जगणं सोपं केलं माझं,.. त्या वारीत नवरा गेला पण काहीही सम्बन्ध नसताना सांभाळणारा लेक दिला ना,.. त्या वारीत तर मला विठ्ठल भेटला,.. मग त्याला कसं विसरू ग म्हणत मावशीने परत विठ्ठलाला हात जोडले,.. डॉक्टर इथं रोज येतो, माझी आस्थेने चौकशी करतो,.. इथल्या सगळ्यांना माझी काळजी घ्यायला सांगतो,.. दृष्टी नाही म्हणून मला तो दिसत नाही काळा की गोरा ग,.. पण मला तो भेटतो कारण त्यानी माणूसपण जपून मला आनंदान जगवलंय,.. मला म्हणाला, ” तुला घरी नेऊ शकतो पण तुझा स्वाभिमान पण टिकायला हवा मावशे,.. त्याची ही हॉस्पिटलची पंढरी मी सांभाळते,.. तो माझ्या विठू सारखा कमरेवर हात देऊन नाही माणसांचे प्रश्न सोडवत पण त्याच्या हातात माझ्या विठुची जादू आहे,.. वारकऱ्यासारखे त्याचे पेशंट इथं जेंव्हा त्याची वाट पहात बसतात आणि तो येऊन त्यांना वेदना मुक्त करून दिल्यावर ते पेशंट जे बोलतात ते ऐकून वाटतं,.. खरंच आता आपल्याकडून वारी होणार नाही म्हणून ह्या डॉकटर रूपातच आता आपल्याला विठू भेटला आणि ही पंढरी दिली आपल्याला,.. एवढं बोलून मावशीने डोळे टिपले,.. “

सकाळी सगळ्या लवकर तयार झाल्या,.. आज वाटेवर येणाऱ्या माऊलीच्या दिंडीत सगळ्यांना सामील व्हायचं होतं,.. सगळ्यांनी मावशीला नमस्कार केला,.. निशाने तो दिवा मावशीच्या हातात दिला,.. तेंव्हा मावशी म्हणाली, “तुमच्या कडून काही घ्यावं म्हणून तुम्हाला नाही ठेवलं इथे, तुम्ही माझ्या लेकी असल्यासारख्या आहात,.. काही देऊ नका. “निशा म्हणाली, “मावशी फरशीवाली आली नाही तर विठुराया अंधारात राहतो ना,.. मग हे विठूसाठी समज,.. मावशी हसून म्हणाली, “थट्टा करतेस का माझी, अग मला दिवा लावताच येत नाही ना,.. निशाने तोपर्यंत मावशीच बोट त्या वातीकडे नेलं आणि म्हणाली, “ही वात पेटवायला काडी लागत नाही,.. ही बटणाने पेटते,.. आता विठू कधीच अंधारात नसेल तुमचा,.. म्हणत मावशीचा हात दिव्यावर फिरवला,.. साखळी हाताला लागताच मावशी म्हणाली, “हा लामणदिवा आहे का,..? “चेहऱ्यावर उजेड धरेल तो आता,..

निशा म्हणाली, ” हो अगदी चेहऱ्यावर,.. तिने कोनाड्यात दिवा लटकवला,.. चेहऱ्यावर सुंदर तांबूस पिवळा प्रकाश पडला,.. त्याक्षणी चेहऱ्यावरचे भाव झरकन बदलले,.. हे सगळं किती छान घडलं ह्याच निशाला मनात आश्चर्य वाटत होतं,.. हा दिवा किती योग्य व्यक्तीसाठी आणल्या गेला,.. आणि ह्या मावशीच्या भेटीमुळे तर वारीला निघण्याआधीच आपल्याला जणू विठ्ठल भेटला,.. असा भाव मनात येऊन निशाचे डोळे पाणावले,.. तिने पटकन मावशीचा निरोप घेतला,.. सगळ्याजणी त्या दिंडीत पावली खेळत सामील झाल्या,.. त्या ठेक्यात सगळं भौतिक सुख हरवलं होतं,.. आणि – – 

आणि – – उरले होते दोनच शब्द.. भेटला विठ्ठल माझा…. भेटला विठ्ठल…..

© सुश्री स्वप्ना मुळे (मायी)

फक्त व्हाट्सअप संपर्क +91 93252 63233

औरंगाबाद

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ मायग्रेन… – भाग-२ ☆ श्री प्रदीप केळूसकर ☆

श्री प्रदीप केळुस्कर

?जीवनरंग ?

☆ मायग्रेन… – भाग-२ ☆ श्री प्रदीप केळूसकर

(पण त्याच्यात सासू दुष्ट दाखवली.. ती सुनेला ठार मारायचा कट करत होती.. शी.. शी. शी.. असल्या मालिका टीव्ही वर दाखवतात.. आपली सून मुलीसारखी.. त्यानी टीव्ही बंद केला आणि त्या नातवाची वाट पाहू लागल्या.) – इथून पुढे —

दुपारी कुणाल आला तेंव्हा त्या खूष झाल्या. आता हा आहे मग हरकत नाही.. तिने जेवण गरम केल आणि नातू आणि ती जेवली. कुणालने तिला मित्रांच्या गमती सांगितलंय.. त्यामुळे ती खूष झाली.. पण जेवण झाल्यावर कुणाल म्हणाला 

‘आजी मी क्लासला जातो.. आता पाचला येईन..

कुणाल क्लासच्या वह्या घेऊन बाहेर पडला आणि पुन्हा त्या एकट्या पडल्या.

जेवणानंतर थोडी झोप काढावी म्हणून त्या गादीवर पडल्या.. चार वाजता नातू क्लासमधून येईल, त्याला भूक लागेल.. काहीतरी त्याच्या आवडीचे खाणे करून ठेवावे म्हणूंन त्या किचनमध्ये गेल्या.. डबे उघडता उघडता त्यान्च्या हातात कुरमुऱ्याचा डबा आला.. मग त्यानी शेंगदाणे शोधून काढले.. चिंच मिळाली.. शेव होता.. त्यानी चिंचेचे पाणी तयार केले.

कुणाल आला तेंव्हा त्यानी मस्त ओलीभेळ त्याला खायला दिली. नातू खूष झाला… आजीच्या गळयात पडला. पाच वाजले तसा नातू खेळायला गेला. पुन्हा त्या ग्यालरीत येऊन बसल्या.. त्यान्च्या डोळ्यासमोर संध्यकाळच्या ऑफिस सुटल्यावर घरी धावताना भाजी घेणाऱ्या बायका आल्या.. सोमनबाई, वर्देबाई, जोशीबाई.. मुमताज.. साबिरा.. या सर्वजणी माझी निश्चित आठवण काढत असणारं. त्याना वाटले आत्ता उठावे आणि दुकानात जावे, पण.. त्यान्च्या डोळ्यसमोर मुलाचा आणि सुनेचा चेहेरा आला आणि त्यानी आवंडा गिळला.

रात्री सून राधा लवकर घरी आली आणि तिने गरमगरम जेवण बनविले आणि मुलाला आणि त्याच्या आईला वाढले. मग नवरा आल्यावर ती दोघे जेवायला बसली.

कित्येक वर्षानंतर कृष्णाबाईंनी दिवस आळसात घालवला.. असा आराम करायची त्याना सवय नव्हती.. रात्री त्याना झोप येईना.. या कुशीवरून त्या कुशीवर होताना त्याना पुढील आयुष्याची काळजी वाटू लागली.. अस रिकामं बसायचे? एक दिवस जाता जाईना… पुढे किती आयुष्य आहे कोण जाणे? दुकान सोडून आपले आयुष्य नव्हते.. तेच आपल्यापासून तुटले.. मग?

 खुप उशिरा त्याना थोडी झोप लागली.. झोपेत त्या हमालावर ओरडत होत्या.. सोमणबाईंना मेथीची भाजी घयायचा आग्रह करीत होता. व्यवस्थित झोप झाली नाहीच.. शिवाय रोजच्या सवइने पहाटे जाग आलीच.. त्याचं डोकं दुखायला लागलं.. अर्ध डोकं.

दिवसभर कृष्णाबाई बेचैन होत्या. मुलगा.. सून.. नातू बाहेर पडली. पुन्हा त्या एकट्या.

त्यात अर्धडोक दुखतं होत. त्यानी वेखंड उगळालं आणि डोकयाला लावल.. पण काहीच फरक नाही. सून ओरडेल म्हणून त्यानी नातवासोबत दोन घास खाल्ले आणि त्या पडून राहिल्या.

नातू दुपारी क्लासला गेला. परत तो यायच्या आधी त्यानी कालसारखी भेळ केली.. आज त्यानी त्यात शेव घातले.. दही घातलं..

दही घातलेली भेळ नातवाला खुप आवडली. तो आजीला म्हणाला

“तुझ्यासारखी भेळ कोणी सुद्धा करत नाही.. तू पाणी पुरी का करत नाहीस?

आपलं दुखणारे डोके दाबत आजी. म्हणाली.. ‘तुझ्यासाठी पाणीपुरी पण करेन.. पण पुऱ्या बाजारातून आणव्या लागतील न्हवं..

“, ते मी आणतो क्लासमधून येताना.. तू मला फक्त पैसे दे.

पुन्हा त्या रात्री कृष्णाबाईंना झोप येईना.. तळमळत त्यानी रात्र काढली. उशिरा थोडी झोप लागली पटकन त्याना जाग आली.. अर्ध डोकं दुखू लागलं.. त्याना सहन होईना. डोकं कशावर तरी आपटावं अस त्याना वाटू लागले. सूर्य उगवेपर्यत त्यानी वाट पाहिली आणि त्या सुनेला म्हणाल्या.. “राधे.. डोस्क लई दुखतंय ग.. काय करू मी? काल वेखंड काढलं.. पण कमी नाही.

“हो का.. यांना सांगते डॉक्टरकडे न्यायला..

अकरा वाजता अनिल रिक्षा घेऊन आला आणि त्यान्च्या फॅमिली डॉक्टर कडे आईला नेले. डॉक्टरनी कृष्णाबाईंना विचारले..

‘काय होते?

‘अर्धडोस्क दुखतंय.. दोन दिस झाले..

डॉक्टरनी त्त्यांचे ब्लड प्रेशर चेक केले.. गोली नियमित घेत असल्याने प्रेशर बरोबर होते.. डॉक्टरनी पल्स रेट पाहिला. तो ठीक होता.. पोट, पाठ सर्व पाहिली.. सर्व ठीक होते.

“झोप लागते का?

“न्हाई.. दोन दिस झोप ठीक नाही.. अर्धडोकं लई दुखतंय.. डोस्क कुठ तरी आपटावं अस वाटतय..

‘बर.. तुम्हाला मायग्रेनचा त्रास आहे..

‘मायग्रेन म्हणजे काय हो डॉक्टर? मध्येच अनिलने विचारले..

“मायग्रेन म्हणजे अर्धशिशी.. अर्ध डोकं दुखतं.. अर्धी मान दुखते.. असह्य वेदना होतात.

“व्हय डॉक्टर,.. माज डोस्क लई दुखतं.. कशामुळे होतो मायग्रेन?

“मायग्रेन हा चिवट आजार आहे.. जाता जाता जात नाही.. सर्दी सुकली असेल तर होतो मायग्रेन किंवा काळजी चिंता जास्त करणाऱ्यांना सुद्धा होतो.. किंवा मेंदू मध्ये काही प्रॉब्लेम असेल तर होतो… आपण बघू.. आजींना मी गोळया देतो दुखणे थांबण्याचा आणि झोप लागावी म्हणून रात्रीची एक गोली देतो. दहा दिवसांनी परत या.

कृष्णाबाईच्या गोळया सुरु झाल्या. झोपेची गोली घेतल्याने थोडी झोप लागत होती.. पण झोप आनंदाची नव्हती, पण डोके दुखायचे थांबत नव्हते. पण त्या नातवासाठी पाणीपुरी किंवा भेळ करत होत्या. एकदा कुणालने आपल्या मित्रांना घरी आणले. बाईंनी सर्वाना पाणीपुरी दिली. त्याचे मित्र एवढे खूष झाले आणि म्हणाले.. आजी, उदया शेवपुरी बनवाल.. आजीने सर्वाना शेवपुरी खायला दिली.. पोरे जाम खूष.. मित्र कुणालला सांगू लागले.. तूझ्या आजीसारखी पाणीपुरी, शेवपुरी कोणी भैय्या सुद्धा करू शकणार नाही.. कुणाल खूष.

 कृष्णबाईचे मायग्रेनचे दुखणे काही कमी होत नव्हते. गोली घेतली की दोन तास बरे वाटायचे.. पण परत सुरु. पुन्हा अनिल आईला डॉक्टरकडे घेऊन गेला.. डॉक्टरनी नुरोफिजिशियन शहा डॉक्टरना भेटायला सांगितले. अनिल आईला शहा डॉक्टरकडे घेऊन गेला.. शहा डॉक्टरनी तपासले औषधे दिली आणि या गोळ्यांनी कमी न वाटल्यास MRI काढून बघूया असा सल्ला दिला.

डॉ. शहा यांच्या गोळ्या कृष्णाबाईंनी सुरु केल्या.. झोपेची गोळी पण सुरु होतीच. बाईंना कळेना एवढी वर्षे कसली गोळी नव्हती पण आत्ताच पाचसहा दिवसात काय हे सुरु झाले?

डॉ. शहा यांच्या गोळया घेऊनही त्याना कमी नव्हते.. थोडा वेळ कमी वाटे. पुन्हा डोके दुखणे सुरु.

रोज संध्याकाळी कुणालची मित्रमंडळी घरी येत होती.. त्याना त्या भेळ, पाणी पुरी, शेव पुरी देत होत्या.. मुले खूष होत होती. एकदिवस कुणालचा मित्र अभय म्हणाला.. आजी, तुम्ही पाणीपुरी.. शेवपुरीचा स्टॉल का लावत नाही? तुमच्या हाताला चव आहे.. कुणालची आजी म्हणाली.. छे.. मी आपली तुमच्यासाठी बनवते.. माजा नातू तशी तुमी. मुले घरी गेली.. पण कुणाल विचार करू लागला.. खरेच.. आजीच्या हाताला चव आहे.. आणि घरी राहून राहून आजी कंटाळली आहे. तो आजीला म्हणाला

“आज्ये.. आपली जुनी भाजीची गाडी मागे पडून आहे.. मी ती दुरुस्त करून आणतो.. आपण भेळ, पाणीपुरीची गाडी सुरु करू.. फक्त संध्याकाळी.. मी क्लासमधून आल्या नंतर. मी खेळायला जाणार नाही.. आपण..

“अरे नको रे.. तुजा बाबा काय म्हंणलं?

‘आई बाबाला कळवायचंच नाही.. फक्त तुझ्यात आणि माझ्यात..

“अरे पण माझा हा मायग्रेन.. डोस्क दुखतं माझं.. शहा डॉक्टर काय ते म्हणत होता..

‘ते बघू नंतर.. मी मागच्या दारची गाडी दुरुस्त करून आणतो..

कुणाल त्त्यांची जुनी भाजीची गाडी घेऊन आला.. त्याने सायकलवाल्यकडे जाऊन हवा भरली… सुतारकडे जाऊन फळी ठेकून घेतली. आजीकडून पैसे घेऊन कुरमुरे, शेव, पुऱ्या, चिंच, शेंगदाणे आदी घेऊन आला.

आई बाबांना न कळवता एक दिवस तो गाडी रस्त्यावर घेऊन आला. पार्क समोर एका झाडाखाली त्याने गाडी लावली.. घाबरत घाबरत त्याची आजी बाकी सामान घेऊन आली.. आणि सुरु झाले.. कुणाल भेळपुरी सेंटर.

आजीला वाटतं होते, नातवाने हौस केली.. गाडी उभी केली. पण आपली डोकेदुखी आपल्याला काही करायला देईल काय?

पार्क मध्ये जाणाऱ्या बायकांचा ग्रुप गाडीकडे थांबला.. आजी आणि नातू भेळ बनवत आहेत हे पाहून त्यानी दहा भेळेची ऑर्डर दिली. आजीनी झटपट भेळ बनवली.. सर्व बायका खूष झाल्या. मग लहान मुले आली.. त्यानी शेवपुरी सांगितली.. आजीनी शेवपुरी करून दिली.. सात वाजेपर्यत आणलेला सर्व माल संपला. बाराशे रुपयाची विक्री झाली. खर्च वजा होता चारशे रुपये सुटले. दोघे घरी आली.

कृष्णाबाईच्या लक्षात आले.. मघापासून डोके दुखायचे थांबले. डोक्यकडे आपला लक्षच गेला नाही. दुसऱ्यादिवशी आजीने नातवाकडे पंधराशे रुपये दिले.. परत सायंकाळी आजी आणि नातू हजर. काल भेळ खालेल्या बायकांनी जाहिरात केली असावी.. कारण आज कालच्या बायका आल्याचं पण त्यान्च्या ओळखीच्या इतर बायका पण आल्या.. त्यानी भेळ खाल्ली.. पाणीपुरी घेतली.. सतत लोक येत राहिली. रात्री आठ वाजेपर्यत आजी नातवाने सर्व माल संपवीला. आज तीन हजाराचा धंदा झाला. आजी खूष.. नातू खूष.

आजीचे मायग्रेन गेले.. झोप गाढ येऊ लागली.

अनिलला वाटतं होते.. अजून आई गोळया घेत असेल म्हणून डोकेदुखी थांबली.. म्हणून त्याने आईला म्हंटले

“आये.. अजून मायग्रेन आहेच का?आणि झोप कशी लागते?

आजीने नातवाच्या हातावर टाळी दिली आणि म्हंटले… अन्या.. झोप मस्त आनी मायग्रेन गेलं भुर्रर्र..

समाप्त –  

© श्री प्रदीप केळुसकर

मोबा. ९४२२३८१२९९ / ९३०७५२११५२

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ मायग्रेन… – भाग-१ ☆ श्री प्रदीप केळूसकर ☆

श्री प्रदीप केळुस्कर

?जीवनरंग ?

☆ मायग्रेन… – भाग-१ ☆ श्री प्रदीप केळूसकर

कृष्णाबाई मटकन टेबलावर बसल्या.. कडक ऊन होत डोकयावर.. उकाडा होता.. मुलाचं. अनिलचे तिच्याकडे लक्ष गेले..

“का.. बर वाटेना.. ?

‘मळमळल्या सारखं झाल.. ऊन हाये ना कडक.. पाणी दे.

मुलानं पटकन पाणी तिच्या हातात दिलं 

“घरी जातेस का, , ? रिक्षा बोलवतो..

मुलाने अनिलने रिक्षा बोलावली आणि हाताला धरून आईला रिक्षात बसवली आणि रिक्षावाल्याला घरचा पत्ता सांगितला. अनिल मनात म्हणाला.. आता आईला घरी थांबायला सांगायचं.. आता मी आहे दुकान सांभाळायला.. आईने तीस वर्षे हे दुकान बघितलं.. शून्यातून इथपर्यत आणलं.. आता पुरे.. किती वर्षे काम करायच, ?

..

कृष्णबाई घरी आल्या.. घरी सून राधा जेवण शिजवत होती.. नातू कुणाल शाळेत गेला होता.. हुश्यहुश्य करत बाई घरात आल्या.. सुनेने हाताला धरून खुर्चीवर बसवले आणि पाण्याचा ग्लास हातात दिला.

“फोन आलेला यांचा.. बर वाटतं नाही आईला म्हणाले.. रिक्षेतून घरी पाठवलाय म्हणाले.. केवढे ऊन पडलय बाहेर.. आता जाऊ नका दुकानात.. हे बघतात न्हवे?

‘बघतोय ग.. पन मलाच.. कृष्णबाई तिथेच लवंडल्या.

दुपारी त्त्यांचा मुलगा अनिल दुकानातून जेवायला घरी आला. त्याची आई बाहेरच्या खोलीतच झोपली होती. तिच्याकडे पहात तो बायकोला म्हणाला 

“आई जेवली का, ?

“नाही.. आल्यात त्या झोपल्यात.. तुम्ही जेऊन घ्या.. मी थांबते त्यान्च्यासाठी..

हातपाय धुवून अनिल जेवायला बसला. जेऊन तो परत दुकानात गेला. थोडया वेळाने कृष्णबाई जाग्या झाल्या, त्यानी सुनेला विचारले..

“अनिल जेऊन गेला काय ग? मला थोडी झोपच लागली.

“होय.. उठा.. आपण जेऊन घेऊ..

कृष्णाबाई हात धुवून आल्या आणि जेवणाच्या खुर्चीवर बसल्या.

‘आई.. खुप वर्षे काम केलंत. आता सत्तरी जवळ आली.. आता धंदा बरा हाय.. दोन पैसे हाईत गाठीला.. दुकान हाये स्वतःचं. ह्ये घर हाय.. तुमचा पोरगा दुकान बघतो की.. आता करा आराम..

“त्ये हाय ग.. पन काम केलेला जीव..

‘आता देवळात जावा.. कीर्तन ऐका.

बागेत जाऊन बसा..

‘अग काही न्हवत बघ.. तुजा सासरा गेल्ला तवा.. चार वारसाचा अन्या पदरात.. घरच्यांनी पाठ फिरवली.. भाजीची गाडी घातली.. गल्लीत या बाजूने घुसायचं आनी दुसऱ्या बाजूने बाहेर पडायचं.. पार वसईची भाजी असायची माझ्या गाडीवर… लोक वाट बघत राहायची माजी.

“होय.. ते मला म्हाईत हाय.. मग हा गाळा घेतलात.. होलसेल भाजी द्यायला लागलात.. दोन टेम्पो घेतलेत.. मग दुसरा गाळा पूर्वेला.. मग हे घर घेतल चार खोल्यांचे.. मला सगळं म्हायती हाय.. पर आता वय झालाय.. आता ईश्रांती नको..

 ‘जमतंय तोपर्यत करायच.. मग हायचं राम राम..

‘पर आता चक्कर आली न्हवं..

‘चक्कर नाय ग. उष्म्याने मळमळ झाली.. म्हणून खाली बसलो.. अन्या घाबरला. बाकी काही नाही.

इतक्यात शाळेत गेलेला तिचा नातू कुणाल घरी आला.. आजीला घरात पाहून तो खूष झाला आणि तिला बिलगला..

“आज्ये.. आज लवकर आलीस..

तेवढ्यात कुणालची आई राधा त्याला म्हणाली ‘आजीला त्रास देऊ नकोस.. तिला बर नाही..

“काय झाल आज्ये?

‘जास्त काही रे बाळा.. ऊन फार आहे ना.. उन्हाळा लागला असेल.. थोडं मळमळलं.. तुजा बाबा घाबरला.. रिक्षा करून घरी धाडला..

आजी घरी असल्याने कुणाल खूष झाला.. त्याचे आणि आजीचे भलतेच गुळपीठ होते. कुणाल मग आजीभोवती फिरू लागला.

रात्री कृष्णाबाईचा मुलगा अनिल घरी आला.. जेवताना आईला म्हणाला 

“आये.. आता दुकानात यायचं न्हाई.. आपली तब्येत संभालायची.. देवळात जा.. ताईकडे जा.. भजनाला जा.. पन उद्यापासून दुकान बंद.

कृष्णाबाई काही तरी सांगायला बघत होत्या, पण मध्येच राधा म्हणाली..

‘होय.. आता घर सांभाळा.. कुठे या वयात पडलाबिडलात तर.. कोन हाय का बघणारे.. आनी तुमी घरी राहिला तर मला कुट तरी जायला मिळल, तुमी घरी असला म्हणजे तुमचा नातू बी खूष असतो.. तवा उद्यापासून दुकान बंद.. तुमचा पोरगा हाय बघणारा..

मग छोटा कुणाल आजीला सांगू लागला.. “आज्ये.. तू आता घरीच रहायचं.. मला गोष्टी सांगायच्या.. बाकी माज्या मित्रांच्या आज्या बघ घरी असतात..

सर्वांनी कृष्णाबाईना घेरलं.. आणि त्याचं दुकानात जायचं बंद केल.

रोजच्या प्रमाणे कृष्णाबाईंना पहाटे चार वाजता जाग आली.. बाकी घरातली सगळी गाढ झोपेत होती.. त्यान्च्या लक्षात आले.. रात्री मुलासुनेने बजावून ठेवलंय.. उद्यापासून दुकानात जायचे नाही.. मग करायचे काय? गेली तीसपस्तीस वर्षे ती सगळं आवरून सकाळी सहाला गाळा उघडत होती.. तोपर्यत भाजीचे टेम्पो दारात हजर होत. ती सगळी भाजी हमालाकडून व्यवस्थित लाऊन घयायची.. मग टेम्पोचे भाडे आणि हमाली देऊन गल्ल्यावर बसायचे… थोडयावेळाने भिक्या आला की त्याला सांगून दुसरा टेम्पो मागवायचा आणि थोडा माल पूर्वेच्या दुकानात पाठवायचा. मग भाजीची गर्दी सुरु होई.. हॉटेल्सची ऑर्डर्स असत. त्यान्च्या ऑर्डर्स प्रमाणे भाजी मोजून रिक्षात भरायची आणि रवाना करायची. दुपारी भाजीचे एजन्ट येत पैसे न्यायला.. हिशेब करून त्याना पेमेंट करायचे.. तोपर्यंत जेवणाची वेळ होई.. सकाळी आणलेल्या डब्यातील चपातीभाजी खायची आणि फळीवरच एक डुलकी काढायची. चार वाजले की एक कप चहा घशाखाली घालायचा तोपर्यत ऑफिस सुटायची वेळ व्हायची आणि बायका पुरुष लगबगिने यायचे आणि पिशवीभर भाजी घेऊन जायचे. रात्री दहा पर्यत गर्दी.. मग हळूहळू आवरायचे आणि घरी यायचे… अनिल लहान होता तेंव्हा शाळेतून परस्पर दुकानात यायचा.. मग दोघे घरी.. भाकऱ्या बडवायच्या आणि भाजी भाकरी खायची.

अनिल मोठा झाला आणि दुकानात बसू लागला. तसे अजून पूर्वेला गाळा घेतला आणि तो पूर्वेच्या दुकानात बसू लागला. मग स्वतःची चार खोल्यांची जागा घेतली आणि अन्या चे लग्न झाले.. राधा घरात आली.. गुणी मुलगी.. सून वाटतच नाही.. लेक.. या बाबतीत आपण नशीबवान. राधाचा भाऊ होता रिकामा.. त्याला धंदा्यात घेतला.. तो पूर्वेचे दुकान बघतो आणि अन्या या दुकानात..

कृष्णाबाई चुळबुळ करत होत्या.. या कुशीवरून त्या कुशीवर.. आता करायच काय? आपल्याला इतर बायकासारखे देवळात जावेसे वाटतं नाही की भजनकीर्तनात रुची नाही. गावात एक मोठी बहीण आहे.. ताई, जिवाभावाची. ती सोडून फारसे नातेवाईक जोडले नाहीत.. दुकानात जायचे नाही तर करायचे काय? एक नोकरी करणारी बाई होती.. रोज संध्याकाळी नोकरीवरून जाताना भाजी न्यायला येई.. मग ती निवृत्त झाली आणि वेड्यासारखे करू लागली. सवाईनुसार ऑफिसात जायची तयारी करी आणि आता ऑफिसत जायचे नाही म्हंटले की कावरीबावरी होई.. तिचा मुलगा सून परदेशी आणि ही एकटी. आपल्याशी बोलायला यायची.. बँकेत जाऊन बसुन राहायची.. बस मधून विनाकारण फिरायची..

मग तिच्या मुलाने तिला वृद्धाश्रमात ठेवले.

कृष्णाबाई उठून ग्यालरीत आल्या.. मुंबई जागी होत होती.. त्याना वाटू लागले पटकन आंघोळ करावी आणि किल्ली घेऊन गाळा उघडावा. सून राधा जागी झाली आणि ग्यालरीत उभ्या असलेल्या सासूला म्हणाली 

‘झोप नाही आली का? रोजची सवय ना. चला चहा करते.. या. सकाळी रेडिओवर गाणी चांगली लागतात.. ती सुनेबरोबर किचनमध्ये आली.. सुनेने रेडिओ लावला.. कुमार गांधर्व गात होते..

‘ पूर्व दिशेला गुलाल उधळत.. न्यान दीप लावीला….

गोरस अरपून.. अवघे गोधन. गेले यमुनेला

उठी उठी गोपाला… उठी उठी गोपाला..

राधाला वाटले कुमार गंधर्वची भूपाळी ऐकून सासूला बरे वाटेल. पण छे.. सासूचे कशात लक्ष नव्हते.. ती सतत घड्याळात पहात होती..

“अन्या उठला न्हाई.. ? गाळा उघडायला नको? टेम्पो दारात हुबे रहाणार. त्याचं भाड.. हमाली..

राधाच्या लक्षात आले.. आपला नवरा अजून दुकानात गेला नाही म्हणून सासू बेचैन झाली आहे..

‘आता दुकानाची चिंता सोडा.. आपलं वय झाल.. आता पुढची पिढी काय बी करेना..

‘अग अस कस.. शिस्त हवी का नको? सातला मी दुकान उघडत होते.. म्हणजे अजून उघडीन पण तुमी जायला देत न्हाई म्हणून.. एवढ्यात अनिल बाहेर आला..

‘आये.. तू चिंता सोड.. मी बराबर धंदा बघणार.. हा मी चाललो पन आता तू आराम करायचा.. चांगल खायच प्यायचं.. सून हाये न्हवं करून घालणारी.. नोकरीवाली कशी पेन्शन घेत्यात.. तशी मी तुला पेन्शन देणार.. कुठ तरी फिरायला जा.. अष्ठविनायक.. शिर्डी. कुठ जाणार बोल?

एवढ्यात तिचा नातू कुणाल बाहेर आला आणि आजीला बिलगला..

त्याला जवळ घेत ती म्हणाली’मी कुट्ट जात न्हाई बघ.. नातवाला जवळ घेत म्हणाली.. ‘हेच माझं पंढरपूर. आनी शिर्डी.

मग राधा जेवणाला लागली.. अनिल दुकानात जायची तयारी करू लागला आणि कुणाल शाळेच्या.

कृष्णाबाई या खोलीतून त्या खोलीत करत होत्या.. मुलगा दुकानात.. नातू शाळेत आणि नवऱ्याला मदत करायला म्हणून राधा पण दुकानात जायला लागली. जाताना राधेने इडली चटणी करून खायला दिली. दुपारचे जेवण करून ती गेली. दुपारी गॅसवर जेवण गरम करून घ्या.. असे सांगायला ती विसरली नाही.

आपल्याला सून चांगली मिळाली याचे त्याना समाधान होते.. पण आता सूनपण दुकानात जाते.. मग आपल्याशी बोलायला कोण? सकाळी सुनेने टीव्ही चालू करून दिला.. पाच मिनिटे त्यानी एक मालिका पाहिली.. पण त्याच्यात सासू दुष्ट दाखवली.. ती सुनेला ठार मारायचा कट करत होती.. शी.. शी. शी.. असल्या मालिका टीव्ही वर दाखवतात.. आपली सून मुलीसारखी.. त्यानी टीव्ही बंद केला आणि त्या नातवाची वाट पाहू लागल्या.

– क्रमशः भाग पहिला 

© श्री प्रदीप केळुसकर

मोबा. ९४२२३८१२९९ / ९३०७५२११५२

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर ≈

Please share your Post !

Shares