मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ साद… ☆ प्रा तुकाराम दादा पाटील ☆

श्री तुकाराम दादा पाटील

? कवितेचा उत्सव ?

☆ साद… ☆ प्रा तुकाराम दादा पाटील ☆

ओळखीची साद येता साथ तू ही देत जा

माणसा माणूस आता माणसांचा होत जा

*

भाट राजानें सारे ओसरीला बांधले

तू नको जाऊस तेथे दूर थोडा जात जा

*

लाभले स्वातंत्र्य आहे ते जरासे भोग ना

मौन तू पाळू नको रे गीत साधे गात जा

*

सातबारा नोंदलेला तोच आहे आपला

वतन आहे मालकीचे ते तुझे तू घेत जा

*

फसवणारे लोक जमले खूप झाले भामटे

आत्मरंगी रंगुनीया वेगळा तू -हात जा

*

गरजवंतांच्या पुढे जा पुरव त्यांच्या मागण्या

मागणारा भेटला की देत हाती हात जा

*

देह पुरता पोसण्याला अन्न पाणी घ्यायचे

लागते जगण्यास जितके तेवढे तू खात जा

© प्रा. तुकाराम दादा पाटील

मुळचा पत्ता  –  मु.पो. भोसे  ता.मिरज  जि.सांगली

सध्या राॅयल रोहाना, जुना जकातनाका वाल्हेकरवाडी रोड चिंचवड पुणे ३३

दुरध्वनी – ९०७५६३४८२४, ९८२२०१८५२६

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ “ती… स्वयंसिद्धा…” – (अनुवादित) हिन्दी कवयित्री : निधी सक्सेना ☆ प्रा.भारती जोगी ☆

प्रा.भारती जोगी

? मनमंजुषेतून ?

☆ “ती… स्वयंसिद्धा…” – (अनुवादित) हिन्दी कवयित्री : निधी सक्सेना ☆ प्रा.भारती जोगी ☆

दाखले नकाच मागू तुम्ही…

ती आहेच स्वयंसिद्धा.

पण, प्रेमात आकंठ बुडालेली असते ना…

तेव्हा स्वतः ला विसरूनच जाते जशी

आपणहूनच बांधून घेते, बंधनात स्वतः ला,

घालून घेते शृंखला पायी…

आपणहूनच अडकवून घेते प्रेमाच्या धाग्यात स्वतः ला…

स्वतः च, स्वतः शी केलेल्या संकल्पासारखी.

तुझ्या प्रेम अंबरात आपल्या इच्छा अगदी सफाईने टाचून ठेवते.

असीम अशी शक्ती दडपून ठेवते

वात्सल्याच्या उतरंडी खाली.

ऐक ना…

पण तू नको हं नजरेआड करूस

तिचं हे स्व समर्पण! 

घालायचंच असेल तर घाल बंधन…

पण… शब्दांत हवं तेवढं, हवं तेव्हा… व्यक्त होण्याचं.

स्वाभिमानाचं आभूषण दे तिला, ल्यायला तिच्या मनावर.

बांधून ठेव तिला तुझ्या प्रेमाच्या रेशमस्पर्शी बेडीत.

तिचा स्व कर की स्वतंत्र… होऊ दे तिला मोकळी.

मग बघ… उत्साहाची कर्णफुले घालून…

सावरीच्या कापसासारखी हलकी होऊन,

आनंद लहरींवर कशी तरंगेल, हर्षोल्लासाने नाचेल.

तुझ्या कितीतरी अशा गोष्टी…

ज्या तिच्या कल्पनेतल्या ; पण तू कधीच न केलेल्या अशा कितीतरी गोष्टीतही

सप्तसुरांचं मधुर संगीत ऐकल्याच्या काल्पनिक आनंदात थिरकलीयं ती…

पण आता मात्र तू एखादं खरंखुरं मधुर गीत बनून येशील… तरच ना सगळं जुळून येईल मनाजोगतं…

येशील कां रे?? … येशील ना???

(‘स्वयंसिद्धा स्त्री’ या निधी सक्सेना यांच्या हिंदी कवितेचा स्वैर भावानुवाद…)

अनुवादिका / कवयित्री : प्रा.भारती जोगी.

पुणे. 

 फोन नंबर..९४२३९४१०२४.

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – क्षण सृजनाचा ☆ ‘रंग… नको बेरंग..’ ☆ श्री दिवाकर बुरसे ☆

श्री दिवाकर बुरसे

☆ क्षण सृजनाचा ☆ ‘रंग… नको बेरंग..’ ☆ श्री दिवाकर बुरसे

होळी व धूलिवंदनाच्या सर्वांना शुभेच्छा! 

या शुभेच्छा देताना ‘यंत्रदास’ आम्हाला सुरक्षिततेच्या काही सूचनाही आवर्जून देतो. सणाच्या रंगांचा बेरंग होऊ नये म्हणून या सूचनांचे पालन करावे आणि सणाचा आनंद लुटावा अशी त्याची आग्रहाची विनंती आहे.

‘श्री सुरक्षितताबोध’ या ग्रंथाच्या ‘बालक्रीडनसुरक्षिततानाम’ अध्याय ५.  श्लोक १२ ते १४ मधे यंत्रदास सांगतोय.

 *

आहा.  बाळके खेळतीं रंग होळी

जळीं लोळतीं (लावुनी भांग गोळी?)

फुगे फोडितीं.  फेकितीं रंग नाना

सिनेमानटासारखे छंद नाना ll१२ll

 *

किती रंग ते.  काय त्यांची झळाळीं!

तेलातले रंग.  ख्याती निराळी

निळे.  तांबडे.  पांढरे वा रुपेरी

जरा लागता… त्याहुनी मिर्चि बsरी! ll१३ll

 *

मना! ऐशिं होळी न केव्हाच खेळीं

(रहावे सुखे खाउनी फक्त पोळी!)

असे रंग ते भंगवीतीं शरीरा

तसा लागतो रे करावा खरारा ll१४ll

*

टीप:-

खरारा: घोड्याचे अंग स्वच्छ करण्याच्या क्रियेला ‘खरारा करणे’ म्हणतात. त्यासाठी वापरल्या जाणा-या बोथट दातेरी.  काटेरी पत्र्यालाही ‘खरारा’ म्हणतात.

यंत्रदास: ‘यंत्रदास’ या टोपण नावाने १९९३ साली ‘ श्रीसुरक्षिततोध ‘ नावाचा.  ‘सुरक्षितता’ (Safety ) या विषयावर मी लिहिलेला ग्रंथ पुण्याच्या ‘टेल्को’ – आताची ‘टाटा मोटर्स’ या कंपनीने प्रकाशित केला होता. ‘ सुरक्षिततेविषयी सामाजिक जाणिवा प्रगल्भ करणारा उत्कृष्ट ग्रंथ’ म्हणून महाराष्ट्र शासनाने विशेष पुरस्कार देऊन या ग्रंथास सन्मानिले आहे.

© श्री दिवाकर बुरसे

पुणे

संपर्कः ९२८४३००१२५, ९५५२६२९२४५

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ “जर मी… तू असते, आणि तू… मी असतास…” – हिन्दी लेखिका / कवयित्री : नादिरा बब्बर ☆ प्रा.भारती जोगी ☆

प्रा.भारती जोगी

? मनमंजुषेतून ?

☆ “जर मी… तू असते, आणि तू… मी असतास…” – हिन्दी लेखिका / कवयित्री : नादिरा बब्बर ☆ प्रा.भारती जोगी ☆

तर… प्रेमाची मितीच बदलली असती.

प्रेमातील दिवसांचे रूपच वेगळं असतं.


तू… तळमळत काढली असतीस आख्खी रात्र, आणि मी… गाढ झोपले असते.

तू… रात्रभर अश्रू गाळत बसला असतास, आणि मी आनंदात, हसत!


तेव्हा तू पत्र लिहिलं असतस, आणि मी… मी ते असच कुठेतरी पडू दिल असतं… विसरून ही गेले असते.

तू… एकटा, एकाकी उभा… खिडकीतून बाहेर बघत… आणि मी..


मी… रात्र रात्र मित्रांच्या मैफिलींमध्ये रंगून जात, त्यांना मोहवत, त्यांची भुलावण करत राहिले असते.

चूक माझी असतांनाही, तू माफी मागितली असतीस.

तेव्हा मी… आणखीनच ताठ होत, ऐट दाखवली असती.

 *जर मी… तू असते, आणि तू मी असतास… तर.. *.


तू आनंद, दु:ख, लज्जा… सगळी गुपिते कानी घातली असतीस माझ्या

आणि मी… मी ती उडवून लावली असती हवेत… निष्ठुर, भावनाहीन, बेपर्वा होऊन.


जेव्हा एकटेपणा असह्य होऊन तू कोसळला असतास पायावर माझ्या

मी… मोठ्या ताठ्याने तूला शहाणपण शिकवलं असतं.

तुझ्या छोट्या छोट्या गोष्टींचं कारण पुढे करत… रोज तुझ्या पासून, थोडी थोडी दूर होत गेले असते मी.


जर तू स्वाभिमानाची लाज राखण्यासाठी म्हणून माझ्याशी बोलला असतास ; तर…

मी… मौन धारण करून सुटका करून घेतली असती माझी.

 *जर मी तू असते, आणि तू मी असतास*

*तर… मितीच बदलली असती प्रेमाची*

जेव्हा तू नाईलाजाने माझी प्रत्येक गोष्ट मानून तडजोड केली असतीस

तेव्हा मी माझा हक्क समजून जीवनात आणखीनच मौज-मजा केली असती.

जीवनाच्या प्रत्येक वळणावर तूला माझी उणीव भासली असती.

पण मला तुझी प्रतिमा, माझ्या परिघात खूपच छोटी वाटली असती.


तू काही सांगत असतास तर मला ते ऐकूच आलं नसत.

तू वारंवार आला असतास, पण मी बोलावलं नसत तूला.

तू हात पुढे केला असतास… मी माझा हात मागे घेतला असता.

तूला हसावसं वाटलं असतं… मी पुन्हा पुन्हा रडवलं असत.


पण… हे सगळं कसं बरं झालं असत?

हे तर केवळ अशक्य ना??

भाग्यरेखा कशी बरं पुसता येईल?

तू तर तूच रहाणार आहेस, आणि मी मीच…

प्रेमाच्या तारखा, आणि मिती ही तशाच रहाणार…

युगानुयुगांची परंपरा ही… कोण बदलणार??

गा-हाणी… व्यथा… घुसमटलेल्या मनांच्या… कोण ऐकणार???

(नादिरा बब्बर यांच्या और तुम होते मैं या हिंदी कवितेचा स्वैर भावानुवाद!)

अनुवादिका / कवयित्री : प्रा.भारती जोगी.

पुणे. 

 फोन नंबर..९४२३९४१०२४.

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – चित्रकाव्य ☆ गळाभेट… ☆ श्री प्रमोद वामन वर्तक ☆

श्री प्रमोद वामन वर्तक  

?️?  चित्रकाव्य  ?️?

☆ गळाभेट...श्री प्रमोद वामन वर्तक ☆

भेट झाली आम्हां भावांची

आला कसा दुर्मिळ योग,

काय असे उद्याचा भरवसा 

कोणा नशिबी कसले भोग!

*
उद्या करेल कोणी ललना

आम्हां कोणाचा शिरच्छेद,

काढ्यात घालून सकाळी 

घालवू पाही आपला मेद!

*

कोणा किसून किसणीवर 

किस कोणाचा तरी पाडेल,

चव वाढवण्या लोणच्याची 

आमचाच उपयोग करेल!

*

आमची आजची गळाभेट 

असेल कदाचित शेवटची,

आयुष्य सदा खर्ची पडते

चव वाढवण्या जिभेची!

चव वाढवण्या जिभेची!

© प्रमोद वामन वर्तक

संपर्क – दोस्ती इम्पिरिया, ग्रेशिया A 702, मानपाडा, ठाणे (प.) 400610 

मो – 9892561086 ई-मेल – pradnyavartak3@gmail.com

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – चित्रकाव्य ☆ पाटा वरंवटा ☆ सुश्री नीलांबरी शिर्के ☆

सुश्री नीलांबरी शिर्के

?️?  चित्रकाव्य  ?️?

? पाटा वरंवटा ?  सुश्री नीलांबरी शिर्के 

पाटा वरंवटा हा तेंव्हा

स्वयंपाकाचा साथी होता

किती वाटा वाटण तुम्ही

कामाला दणकट होता!!

*

बारीक, भरडे हवे तसे

कौशल्यच हातजोराचे

घरच्याघरात स्त्रियांसाठी

जिमच होते जणू ते घरचे!!

*

चव त्यामुळे पदार्थाची

जिभेवर रेंगाळत राही

घरचे जेवण सकस असे

पंगतीतही कौतक होई!!

*

कधी वडारीण दारावरती

टाकी लाऊन देण्या येई

टाकी लावता पाटावरवंटा

सेवेला परत तयार होई!!

*

बारशात कधी हा वरवंटा

बाळा आधी पुजला जाई

गोविंद घ्या, गोपाळ घ्या ची

बाळा आधी गोपा होई!!

*

अजूनही किचनमधे माझा

अस्तित्वात पाटा-वरवंटा

कित्येक वर्षे स्वयंपाकात

खुपच होता त्याचा वाटा!!

*

लहानमोठा दगडी खलबत्ता

यांचा तेंव्हा दुजा साथी होता

छोठ्या टेचायाच्या कामी

चुलीजवळच हाती होता!!

*

पाट्या वरंवट्याच्या सोबत

आजही येते त्याची आठवण

श्वास चालू आहे तोवर राही

मनात आठवणींची साठवण!!

© सुश्री नीलांबरी शिर्के

मो 8149144177

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ हेचि दान देगा देवा… ☆ श्री अनिल वामोरकर ☆

श्री अनिल वामोरकर

? कवितेचा उत्सव ?

☆ हेचि दान देगा देवा… ☆ श्री अनिल वामोरकर ☆

पाहीले मी

एक स्वप्न नवे

दूर गवताचे हिरवेगार,

गालीचे होते पसरले…

 

नदी नाले

ओसंडून वाहत होते,

नाद खळाळत्या पाण्याचा

कानात घुमतो आहे..

 

प्रत्येकाच्या

होते सुहास्य वदनी,

मतमतांतरे होती

मन भिन्नता मात्र नव्हती..

 

नव्हते कुणाच्याही

मनात जातीपातीचे किल्मिषे

धार्मिक सण साजरी होई

उत्साने, आनंदाने..

 

स्वप्नात पाहीले

ते सत्यात उतरु दे

राहू दे गुण्यागोविंदाने

देवा हेचि दान दे…

© श्री अनिल वामोरकर

अमरावती

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ अंकुरित आभाळ… ☆ सुरेखा चिखलकर ☆

सुरेखा चिखलकर

संक्षिप्त परिचय 

सुरेखा महिपती चिखलकर

शिक्षण – B.A. मराठी
दिव्यांग – 80% दोन्ही पायांनी

सध्या सामाजिक कार्य, कवयित्री, ब्यूटी पार्लर आणि लेडीज शॉप चालवते. सामाजिक कार्यासाठी महाराष्ट्र शासनाचा पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर पुरस्कार, आणि साहित्यिक 30 आसपास पुरस्कार.वाचन आणि लेखन अविरत चालू आहे…

 

? कवितेचा उत्सव ?

☆ अंकुरित आभाळ… ☆ सुरेखा चिखलकर ☆

अजाणत्या वयात कळत नव्हते काही

सर्वासारखे मला उभे राहता येत नाही…

*

पण याच जमिनीत एक स्वप्नांचा अंकुर रुजला ,

पंख नसतानाही आभाळाकडे झेप घेण्याचा ध्यास लागला..

*

दोन्ही हात जमिनीवर उड्या मारण्याची हौस भारी ,

पण ह्याच जिद्दीतून फुलली माझ्या अस्तित्वाची गाथा खरी..

*

कळले जेव्हा बालमनाला दोष दिला नाही देवाला

आरूढ झाले दैवावरती केली सुरवात शिकण्याला…

*

केली चिरफाड पायांची जिद्द होती उभे राहण्याची

 नशिबाने दिली आस मिळाली साथ कुबड्यांची …

*

शिक्षणाची पायरी दिवसेंदिवस चढत नव्या उमेदीने घडत होते,

लेखणीच्या बळावर मी आभाळालाही स्पर्श करत होते…

*

तुटले होते पंख जरी घेतली झेप उडण्यासाठी

अंकुरलेल्या स्वप्नांना कवेत घेण्यासाठी…

*

बनेल उदाहरण प्रत्येकाला सोडून लाचारी भिड आयुष्याला

थकतील पाय जरी पथ चाल तू घडण्याला…

*

नाही  आशा मला उद्याची धडपडते मी मनोरुग्णांसाठी,

मांडते रोज नवा डाव स्वतःशीच पुन्हा जिंकण्यासाठी..

*

धन्य ती माझी मायमाउली  उभी मी आज तिच्यासाठी,

जोपासले तिने कष्टाने ताठमानेने लढण्यासाठी…

*

ऋण तुझे फेडण्यास आई नको दुसरी ओटी,

पुन्हा पुन्हा जन्म मिळो माय तुझ्याच ग पोटी

🙏 

© सुरेखा महिपती चिखलकर

गोटखिंडी, तालुका वाळवा

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ मनाचे श्लोक – एक सार्वकालिक ‘मनोपनिषद’… – श्लोक ७ आणि ८ ☆ श्री विश्वास देशपांडे ☆

श्री विश्वास देशपांडे

? इंद्रधनुष्य ?

☆ मनाचे श्लोक – एक सार्वकालिक ‘मनोपनिषद’… – श्लोक ७ आणि ८ ☆ श्री विश्वास देशपांडे ☆

श्लोक ७ – –

मना श्रेष्ठ धारिष्ट्य जीवी धरावे |

मना बोलणे नीच सोशीत जावे |

स्वये सर्वदा नम्र वाचे वदावे |

मना सर्व लोकांसि रे निववावे |७ |

अर्थ : हे मना तू धीराचा अंगीकार कर म्हणजेच तुझ्या ठायी धैर्य असू दे. लोकांनी निंदा किंवा टीका केली तरी ती सहन कर. बोलताना नेहमी नम्रतेनेच बोल आणि आपल्या बोलण्याने आणि वागण्याने लोक संतुष्ट होतील असे वाग.

या श्लोकात समर्थांनी मनाला फार सुंदर उपदेश केला आहे. तो लक्षात घेण्याआधी मागील श्लोकाचा संदर्भ घेऊया. मागील श्लोकात समर्थ म्हणतात,” साधकाने काम क्रोध मोह इत्यादी विकारांपासून दूर राहिले पाहिजे.” अर्थात हे दूर राहणे सोपे नाही. त्यासाठी काय करायला हवे ते समर्थ या श्लोकात आपल्याला सांगतात. समर्थ म्हणतात, “आपण धैर्याचा अंगीकार करायला हवा. जीवनामध्ये अनेक संकटे येतात, मोहाचे प्रसंग येतात, आपली परीक्षा पाहणारे प्रसंग येतात. या सगळ्या प्रसंगामध्ये आपले मानसिक धैर्य टिकवून ठेवणे आवश्यक असते. ही एक प्रकारची साधना आहे जी सरावाने जमू शकते.

ज्याला प्रवाहविरुद्ध पोहायचे आहे आणि काही विशेष कर्तृत्व करून दाखवायचे आहे, त्याच्या अंगी धैर्य तर हवेच ! छत्रपती शिवाजी महाराजांना लढाईमध्ये काही वेळा माघारही घ्यावी लागली. प्रत्यक्ष श्रीकृष्णाला देखील रणांगणातून पळ काढावा लागला. स्वामी विवेकानंदांना देखील अनेक समस्यांचा, टीकेचा, नींदेचा सामना करावा लागला. परंतु या सगळ्या महापुरुषांनी कठीण परिस्थितीतही आपले धैर्य टिकवून ठेवले. संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम यांच्यासारख्या संतांना तर केवढी लोकनिंदा सहन करावी लागली परंतु  आपण अंगीकारलेले समाजप्रबोधनाचे कार्य ते करीतच राहिले.

अशा महापुरुषांना निंदा आणि स्तुती, सुख आणि दुःख समान असतात. त्यामुळे ते विचलित होत नाहीत. रामाला राज्याभिषेक होणार होता. तो त्याच्या जीवनातील अत्यंत आनंदाचा प्रसंग होता. परंतु दशरथाने कैकयीला दिलेल्या वरामुळे त्याला वल्कले धारण करून वनवासात जावे लागले. परंतु याही परिस्थितीत त्याने आपले धैर्य आणि आनंदी वृत्ती सोडली नाही. आणि अशाही परिस्थितीत भरताला माता कैकयीकडे दुर्लक्ष करू नकोस असे सांगण्यास तो विसरला नाही. म्हणूनच महापुरुषांचे जीवन म्हणजे दीपस्तंभ असतात. कोणत्या परिस्थितीत कसे वागावे याचा वस्तूपाठ ते आपल्याला घालून देतात. म्हणूनच ते गुण अगदी धारण करण्यासाठी समर्थ आपल्याला तोच उपदेश करतात.

माणसाला स्तुती आवडते परंतु जेवढ्या सहजतेने आपण स्तुतीचा स्वीकार करतो तेवढ्याच सहजतेने निंदेचा करू शकत नाही. त्यासाठी धैर्य लागते. म्हणूनच समर्थ म्हणतात मना बोलणे नीच सोशीत जावे. या ठिकाणी धैर्याचा आणि टीका सहन करण्याचा दुसराही एक अर्थ घेता येईल. तो म्हणजे मनावर संयम राखणे, प्रतीक्षा करणे. प्रत्येकाच्या जीवनामध्ये काही एक काळ असा येतो की त्या प्रसंगामध्ये त्याला मनावर संयम ठेवून कठीण प्रसंगांना तोंड द्यावे लागते. आजच्या पिढीत हा संयम, हे धैर्य कमी होताना दिसते आहे. तरुण अपयशाचा स्वीकार आणि अपमानाचा सामना सहजपणे करू शकत नाहीत. जी गोष्ट आपल्याला हवी आहे ती मिळायलाच हवी ती नाही मिळाली तर ते एक तर खचून जातात किंवा हिंसक बनतात. अशी अनेक उदाहरणे आपण व्यवहारात पाहतो. म्हणूनच धैर्य अंगीकारणे, अपमान सहन करणे याचे प्रशिक्षण मनाला देणे आवश्यक आहे. ती वृत्ती अंगी बाणवावी लागते. मुलांना सुद्धा आई-वडिलांनी कठीण परिस्थितीचा सामना करणे, संकटात खचून न जाणे आणि अपयश आले तरी त्यातून पुन्हा उभे राहण्याची हिंमत ठेवणे या गोष्टी शिकवायला हव्यात. क्रिकेटसारख्या किंवा अन्य खेळांमधूनही अशा प्रकारची वृत्ती आपल्याला शिकायला मिळते. एखादा सामना हरला तरी निराश न होता, खेळाडू पुढचा सामना कसा जिंकता येईल त्या तयारीला लागतात. या सगळ्या गोष्टींमध्ये यश आणि अपयश सहजपणे कसे स्वीकारायचे याचे सुंदर शिक्षण आपल्याला मिळते.

जीवनामध्ये वागताना नम्रतेने बोलणे आवश्यक आहे. तसे संस्कार लहानपणापासून व्हायला हवेत ओल्या मातीच्या गोळ्याला हवा तसा आकार देता येतो म्हणूनच पालकांनी तसे आपल्या मुलांना संस्कार द्यायला हवेत. ही नम्रता आतून घ्यायला हवी. ती मनाची वृत्ती व्हायला हवी. बऱ्याच वेळा आजच्या कार्पोरेट जगामध्ये काही लोक कृत्रिम नम्रता किंवा विनय धारण करताना दिसतात. परंतु त्या गोष्टी मनापासून नसतील तर त्या गोष्टी म्हणजे एक प्रकारचे ढोंगच !

श्रीकृष्ण, श्रीराम यांचे सर्वांशी वागणे-बोलणे कसे होते हे पालकांनी गोष्टीतून मुलांना शिकवायला हवे. त्यांच्याजवळ ज्ञान होते, सामर्थ्य होते. परंतु तरी देखील त्यांनी आपली नम्रता सोडली नाही. संत तुकाराम महाराज म्हणतात,” नम्र झाला भुता, त्याने कोंडीले अनंता.” त्याचे तात्पर्य हेच आहे. आपल्या बोलण्याने दुसऱ्याचे समाधान झाले पाहिजे, दुसरी व्यक्ती संतुष्ट झाली पाहिजे अशा पद्धतीने बोलता आले पाहिजे. आपले म्हणणे दुसऱ्याला न दुखवता देखील उत्तम पद्धतीने सांगता येते. या गोष्टी वरील महापुरुषांच्या उदाहरणांकडे पाहिले तर आपल्या सहज लक्षात येतात.

या श्लोकात समर्थांनी धैर्य, संयम, नम्रता आणि गोड बोलणे ही आपल्या जीवनाला दिशा देणारी चतु:सूत्री दिली आहे. ती आपण लक्षात घ्यायला हवी.

स्वसंवाद: 

  • संकटसमयी माझे मन स्थिर राहते का, की लगेच खचते ?
  • टीका झाली तर मी संतुलित राहू शकतो का ?
  • माझ्या वागण्या, बोलण्यात नम्रता आणि सौजन्य आहे का ?
  • माझ्या बोलण्याने लोक संतुष्ट होतात का ?

– – –

श्लोक ८ वा – – – 

देहे त्यागिता कीर्ति मागे उरावी |

मना सज्जना हेचि क्रीया धरावी |

मना चंदनाचे परी त्वां झिजावे |

परी अंतरी सज्जना नीववावे |८|

अर्थ : हे मना ( सज्जन माणसा ), तुझी वागणूक अशा प्रकारे असू दे की मृत्यू पावल्यानंतरही तुझी कीर्ती मागे राहील. सुगंध देण्यासाठी चंदन ज्याप्रमाणे स्वतःला झिजवते अशाच प्रकारे तू देखील इतरांसाठी झिजून सज्जनांना संतोष होईल अशा प्रकारे वागावे.

माणसाचा देह नाशिवंत आहे. जो जन्माला आला त्याला एक दिवस मृत्यू निश्चित आहेच. जीवन आणि मृत्यू यांच्या दरम्यानचा कालावधी म्हणजे आपले आयुष्य. एखादी व्यक्ती किती जगली यापेक्षाही ती कशी जगली हे अधिक महत्त्वाचे. शंभर वर्षांचे दीर्घायुष्य मिळवून आपले आयुष्य मौजमजेत घालवणाऱ्या व्यक्तीपेक्षा अल्पायुष्य लाभलेल्या परंतु इतरांच्या सेवेत आपले जीवन घालवणाऱ्या व्यक्तीचे जीवन कधीही श्रेष्ठ ! स्वामी विवेकानंदांना उणेपुरे चाळीस वर्षांचे आयुष्य लाभले परंतु या आयुष्यात त्यांनी जी मानवतेची सेवा केली ती अनेक जन्म घेऊनही इतरांना करणे कठीण आहे. आपले आयुष्य सत्कारणी लावायचे असेल तर त्यासाठी इतरांसाठी झिजण्याची तयारी हवी.  एक सुंदर मराठी गीत आहे…

आनंद या जीवनाचा, सुगंधापरी दरवळावा

गाण्यातला सूर जैसा ओठांतुनी ओघळावा

झिजूनी स्वतः चंदनाने

दुसर्‍यास मधुगंध द्यावा…

शीतलता आणि सुगंध हे चंदनाचे गुण आहेत. ते इतरांना देण्यासाठी ते स्वतः झिजत असते. चंदन रोज सहाणेवर थोडे थोडे उगाळले जाते. असे करताना त्याची झीज होत असते. परंतु ही झीज सोसून ते इतरांना सुगंध आणि शीतलता प्रदान करते. आपण असेही म्हणतो की जे हात इतरांना सुगंध वाटतात, त्या हातांनाही सुगंध येतो. तो गंध त्यांना आपोआप प्राप्त होतो.

इतरांसाठी काही करायचे तर फक्त एक दिवस झिजून चालत नाही. ती सवय व्हावी लागते, वृत्तीला तसे वळण लावावे लागते. म्हणूनच समर्थ म्हणतात मना सज्जना हेचि क्रीया धरावी. अशा प्रकारचे सेवेमध्ये सातत्य असावे लागते. अशा प्रकारचे सातत्य जर आपल्या सेवेत आणि वागण्याबोलण्यात असेल तर त्यामुळे सज्जन म्हणजे समाजातील सदाचरणी लोक प्रसन्न होतात, संतुष्ट होतात.

समाजातील बऱ्याच लोकांकडे सत्ता आणि संपत्ती असते. त्यातील काही लोक आपल्या सत्तेच्या आणि संपत्तीच्या बळावर विविध संस्थांना देणग्या देऊन आपले नाव द्यायला लावतात. विविध प्रकारे प्रसिद्धी मिळवण्याचा प्रयत्न करतात. तशी ती त्यांना काही काळ मिळते देखील. इमारतीच्या फलकांवर किंवा दगडांवर त्यांचे नाव कोरले गेलेले असते. तरीदेखील काही काळानंतर अशा व्यक्ती विस्मृतीत जातात. परंतु कोणत्याही प्रकारचा स्वार्थ किंवा प्रसिद्धीची हाव न धरता जे सातत्याने समाजासाठी झिजत असतात, अशा व्यक्तींचे नाव समाज कायम आदराने घेत असतो. अशा व्यक्तींचे नाव समाजाच्या मनात कोरले जाते. त्याला कायमस्वरूपी आदराचे स्थान असते. अहिल्याबाईंनी आपला राज्यकारभार करत असताना समाजासाठी घाट बांधले, अन्नछत्रे पाणपोया उभारल्या. यासारखी विविध प्रकारची कामे केली आणि त्यासाठी पैसा खर्च केला. त्यामुळे आपण आजही त्यांचे नाव आदराने घेतो. इतरांची नावे विसरली जातात. म्हणूनच त्यांची कीर्ती आजही जिवंत आहे.

समर्थांचा संदेश स्पष्ट आहे —

.. .. ..  कीर्ती मागे राहावी असे वाटत असेल तर आयुष्य इतरांसाठी झिजवले पाहिजे. आणि हे झिजणे एकदाच नव्हे, तर वृत्ती म्हणून अंगीकारले पाहिजे.

“मना सज्जना हेचि क्रीया धरावी” —

.. .. .. ही कृती, ही वृत्ती, ही सातत्यपूर्ण सेवा — हाच खरा साधनेचा मार्ग आहे.

स्वसंवाद :

  • मी केवळ स्वतःसाठी जगतो आहे की इतरांसाठी झिजून त्यांनाही आनंद देण्याचा प्रयत्न करतो आहे ?
  • माझ्या कृतींमागे प्रसिद्धीची अपेक्षा आहे का, की निखळ सेवाभाव ?
  • हा सेवाभाव मी एक वृत्ती म्हणून अंगीकारला आहे का ?
  • माझ्या वागण्याने किंवा सेवाभावाने समाजातील सज्जन किंवा सदाचरणी लोक संतुष्ट होतात का ?

– क्रमशः श्लोक ७ आणि ८ .   

© श्री विश्वास देशपांडे

चाळीसगाव

प्रतिक्रियेसाठी ९४०३७४९९३२

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ नाते असावे असे… ☆ प्राची अभय जोशी ☆

प्राची अभय जोशी

? कवितेचा उत्सव ?

☆ नाते असावे असे… ☆ प्राची अभय जोशी ☆

माती आणि दगडाचे

असे आगळे वेगळे नाते

सृष्टी मात्र दोघांनाही

स्वतः सारखेच जपते.

 

पहिल्या पावसाची माती

ओला सुगंध पसरवते

दगड भिजतो तेंव्हा मात्र

त्याला लकाकी येते

 

पावसातील माती ही

अवखळपणे वाहते अन्

दगडाचे दिसून येते

एकाच जागी स्थिरावणे.

 

माती आणि दगडाचे हे

प्रतिक आहे भावनांचे

प्रत्येक वेळी विरघळताना

असे स्थिरतेने पाहणे

 

दोघांकडेही पाहताना वाटे असे सारखे,

दगडाचे फक्त पाण्यात भिजणे…

अन्

मातीचे अगदी निरागसतेने विरघळणे…

 

भिजणे आणि विरघळणे जणू

हे असे निसर्गाचे सांगणे

या मानवाचे,

एकमेकांचे असे होऊ शकते का

स्वच्छ आणि नितळ नाते ?

©  प्राची अभय जोशी

मो 9822065666 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares