मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ केवळ नावापुरती… ☆ श्री विनायक कुलकर्णी ☆

श्री विनायक कुलकर्णी

? कवितेचा उत्सव ? 

केवळ नावापुरती… ☆ श्री विनायक कुलकर्णी ☆

केवळ नावापुरती आहे इथली समता

गब्बर झाला नेता आणिक दुबळी जनता

 *

सन्मानांच्या पदकासाठी लागेबांधे

गुणवंतांची झाली गोची असून क्षमता

 *

शिकावयाला गेला मुलगा तिथेच रमला

पालनपोषण करून थकली वेडी ममता

 *

छाती काढुन पुढे निघाले लबाड सारे

सत्यवान तर हरेक इथला झाला नमता

 *

साव जाहला बदनामी अन् चोर गाजला

का झोलांची वाढत आहे नुसती घनता

© श्री विनायक कुलकर्णी

☎️86000 81092

≈ संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ मनाचे श्लोक – एक सार्वकालिक ‘मनोपनिषद’… – श्लोक ७३ आणि ७४ ☆ श्री विश्वास देशपांडे ☆

श्री विश्वास देशपांडे

? इंद्रधनुष्य ?

☆ मनाचे श्लोक – एक सार्वकालिक ‘मनोपनिषद’… – श्लोक ७३ आणि ७४ ☆ श्री विश्वास देशपांडे ☆

श्लोक क्र. ७३ – – 

देहेदंडणेचे महा दुःख आहे।

महादुःख ते नाम घेता न राहे।

सदाशिव चिंतीतसे देव देवा।

प्रभाते मनी राम चिंतीत जावा।। ७३।।

अर्थ : देहाला कष्ट दिल्याने मोठया यातना होतात. परंतु रामनाम घेतल्याने या यातना राहत नाहीत. प्रत्यक्ष भगवान शंकर देखील देवाधिदेव म्हणजेच श्रीरामाचे चिंतन करतात. अशा श्रीरामाचे प्रभात समयी आपण चिंतन करावे.

(देहेदंडणे – देहाला कष्ट/यातना देणे )

विवेचन : अनेक लोक परमेश्वर प्राप्तीसाठी उपासतापास, नवस, तीर्थयात्रा आदी गोष्टी करतात. या सगळ्या गोष्टींनी देहाला कष्ट होतात. त्याच्या यातना किंवा दुःख भयंकर असते. सर्वांनाच या गोष्टी शक्य होतील असेही नाही. नर्मदा परिक्रमा करणे अतिशय पुण्यप्रद मानले जाते. परंतु सर्वांनाच ते शक्य होईल अशातला भाग नाही. बद्रीनाथ, केदारनाथ ही अत्यंत पवित्र धामे आहेत. पण जर शारीरिक क्षमता नसेल तर त्यांची यात्रा करणे कठीण होते. देहाला त्रास देणारी होते. पूर्वीच्या काळी ऋषीमुनी तप:साधना करीत असत. त्यासाठी एकांतात जाऊन बारा बारा वर्षे तपश्चर्या करीत. कोणी एका पायावर उभे राहून तप करीत असे तर कोणी नदीच्या पाण्यात उभे राहून. असे अनेक प्रकार होते. या सगळ्या गोष्टींचा उद्देश देहाबद्दलची आसक्ती नाहीशी व्हावी आणि परमेश्वर प्राप्तीकडे मनाचा कल व्हावा असा असायचा. परंतु देहाला एवढे कष्ट देऊन सर्वांनाच परमेश्वर प्राप्ती होईल अशी शाश्वती नव्हती. शिवाय काही कारणाने तप करणे मध्येच थांबले तर सर्वच व्यर्थ जायचे.

परंतु नामसाधनेत असे कष्ट देहाला पडत नाहीत. नामसाधना सोपी आहे. तुकाराम महाराज देखील सांगतात, “नामसंकीर्तन साधन पै सोपे, जळतील पापे जन्मांतरीची. “मग एवढे सोपे साधन सोडून देहाला ताडन करणारी इतर साधने का अवलंबावीत ?

या संसारात देखील मानवी देहाला अनेक प्रकारचे कष्ट होतात. नानाविध त्रासांना सामोरे जावे लागते. प्रारब्धाने वाट्याला आलेले दुःख भोगावेच लागते. या सगळ्या गोष्टीत शरीराला प्रचंड त्रास होतो. आपण म्हणतो की कोणी कोणाचे दुखणे वाटून घेऊ शकत नाही. हे खरेच आहे. प्रारब्धाने आलेले दुःख ज्याचे त्यालाच भोगावे लागते. पण सगळ्या परिस्थितीत रामनाम औषधाचे काम करते. देहाला वेदना होतील पण रामनामामुळे तो त्रास मनापर्यंत पोहोचत नाही. देहाच्या दुःखावर इतर औषधे तात्पुरती काम करतात पण रामनाम त्यावर मात करण्याची शक्ती देते. मात्र ते औषध नियमितपणे घोट घोट पोटात जायला हवे.

रामनामाचे इतके महत्व समर्थ पुन्हा पुन्हा सांगत आहेत. एखाद्याला एखादी गोष्ट सांगून, समजावूनही पटली नाही तर त्याला एखाद्या मोठया व्यक्तीचे उदाहरण देऊन समजवावे लागते. समर्थ म्हणतात, ” हे मना, अरे तुला किती आणि काय सांगू ? प्रत्यक्ष योगियांचा राणा असलेले भगवान शंकर देखील श्रीरामाचा जप करतात. त्याचेच चिंतन करतात. मग तुला करायला काय हरकत आहे ?” श्रीराम हे देवांचे देव आहेत. त्यांनीच देवांना रावणाच्या बंदिवासातून सोडवले आहे. आदी आणि अंत तेच आहेत. तेव्हा हे मना, प्रभात समयी रामाचे चिंतन कर.

स्वसंवाद :: 

१. मी परमेश्वर प्राप्तीसाठी किंवा समाधानासाठी केवळ बाह्य कष्टांचे (उपासतापास, कठीण व्रतवैकल्ये) अवडंबर माजवत आहे का?

२. जेव्हा शारीरिक किंवा मानसिक व्याधींमुळे माझ्या देहाला ‘दुःख’ होते, तेव्हा मी निराश होतो की रामनामरूपी औषधाचा आश्रय घेतो?

३. “कोणी कोणाचे दुखणे वाटून घेऊ शकत नाही” हे त्रिकालाबाधित सत्य स्वीकारून, मी माझ्या मनाला नामस्मरणाने खंबीर बनवले आहे का?

४. जर प्रत्यक्ष भगवान शंकर (देवाधिदेव) निरंतर रामनामाचे चिंतन करतात, तर मग संसारी असलेल्या माझ्या मनाला नामस्मरणाचा संकोच का वाटावा?

============== 

श्लोक क्र. ७४ – – 

बहुतांपरी संकटे साधनाची।

व्रते दान उद्यापने ते धनाची।

दिनाचा दयाळू मनी आठवावा।

प्रभाते मनी राम चिंतीत जावा।। ७४।।

अर्थ : परमेश्वर प्राप्तीच्या साधनांमध्ये अनेक प्रकारच्या अडचणी येतात. व्रते, दानधर्म, उद्यापन करणे या गोष्टींसाठी गाठीशी पैसा लागतो. परंतु दिनांसाठी दयाळू असणाऱ्या भगवंताला आठवण्यासाठी यापैकी कशाची जरुरी नाही. म्हणून अशा या भगवंताचे पहाटेच्या सुमारास चिंतन करावे.

(बहुतांपरी – अनेक प्रकारचे, साधनांची – ईश्वर प्राप्तीच्या विविध मार्गांची, उद्यापन – एखाद्या व्रताच्या अखेरीस केलेला धार्मिक विधी )

विवेचन : ईश्वरप्राप्तीचे अनेकविध मार्ग आहेत. त्यासाठी कोणी व्रतवैकल्ये करतो, कोणी एखादे अनुष्ठान करतो, तर कोणी दानधर्माचा मार्ग अनुसरतो. आपण कोणता मार्ग निवडायचा याचे स्वातंत्र्य अर्थातच साधकाला असते. तरी समर्थ या मार्गातील धोके आणि अडचणी आपल्या निदर्शनास आणून देतात. या सगळ्या गोष्टींसाठी धनाची जरुरी असते. व्रत करायचे म्हटले तर काही तरी नियम आलाच. त्यानुसार शरीराला पडणारे कष्टही आले. शिवाय व्रताचे काही नियम असतात. त्यांचे व्यवस्थित पालन झाले पाहिजे. व्रत व्यवस्थित पूर्ण झाल्यानंतर त्याची विधिपूर्वक सांगता करावी लागते. त्यासाठी पुरोहितांना बोलावून धार्मिक विधी, दानधर्म, दक्षिणा आदी गोष्टी कराव्या लागतात.

व्रत, दानधर्म आणि उद्यापने या गोष्टी करायच्या तर पैशाची व्यवस्था आधी करावी लागते. बरे, या सगळ्या गोष्टी म्हणजे परमेश्वर प्राप्तीसाठीचे बाह्य मार्ग झाले. हे सगळे करीत असताना माणूस यातच गुंतून पडतो. परमेश्वर प्राप्तीसाठी अंतर्मुख होण्याची आवश्यकता असते. तो आपल्या अंतर्यामीच वसलेला असतो. सगळे लोक व्रतवैकल्ये, उद्यापन सोहळे, दानधर्म आदी गोष्टी समारंभपूर्वक करतात म्हणून आपल्यालाही असे करायलाच हवे नाहीतर लोक काय म्हणतील अशी भीती सामान्य माणसाच्या मनात असते. बऱ्याच वेळा मग इतरांना दाखवण्यासाठी देखील असे विधी मोठे समारंभपूर्वक करावे लागतात. यात आर्थिक आणि मानसिक कुतरओढ होते ती सर्वसामान्य माणसाची. त्याचा गोंधळ होतो. नेमके काय करावे ते कळत नाही. सगळी सोंगे आणता येतात पण पैशाचे सोंग आणता येत नाही. पण परमेश्वर यापैकी कुठल्याच गोष्टीची अपेक्षा तुमच्याकडून करत नाही.

समर्थांसारख्या संतांना या गोष्टीची अचूक जाणीव असते. समर्थांच्या काळात तर सामान्य माणूस जपतप, अनुष्ठान, व्रते, उद्यापने यासारख्या कर्मकांडात अडकून पडला होता. तो बहिर्मुख झाला होता. त्याला अंतर्मुख करणे आवश्यक होते. समर्थांसारखे सद्गुरू लोककल्याणाचा कळवळा असल्यानेच नामस्मरणासारखा सोपा मार्ग सांगत आहेत. परमेश्वर हा अत्यंत दयाळू आहे. त्याची दीन होऊन म्हणजेच आर्ततेने भक्ती केली, तर तो आपल्या दासांवर कृपा करतो. ‘ नुपेक्षी कदा राम दासाभिमानी ‘ असे समर्थांनी सांगितलेच आहे. आपणही तो मार्ग अनुसरावा. दीनांचा दयाळू असलेल्या भगवंताला मनी आठवावे. त्याचे रूपगुण अंतरी साठवावे. अशा या भगवंताचे प्रभात समयी चिंतन करावे. संत एकनाथ महाराज म्हणतात, ” आवडीने भावे हरिनाम घेशी, तुझी चिंता त्यासी सर्व आहे. “

स्वसंवाद :: 

१. मी करत असलेल्या धार्मिक गोष्टी (व्रतवैकल्ये किंवा पूजा) केवळ ‘इतरांना दाखवण्यासाठी’ किंवा एक सामाजिक प्रथा म्हणून करत आहे का?

२. भगवंत माझ्या अंतर्यामीच आहे हे ठाऊक असूनही, मी त्याला शोधण्यासाठी बाह्य कर्मकांडात आणि सण-समारंभांच्या अवडंबरातच गुंतून पडलो आहे का?

३. जेव्हा माझ्याकडे आर्थिक मर्यादा असतात, तेव्हा मी देवाचा कोप होईल या भीतीने व्याकुळ होतो, की “तो दीनांचा दयाळू आहे” या भावनेने त्याला आर्ततेने साद घालतो?

४. संत एकनाथ महाराजांनी म्हटल्याप्रमाणे, मी सर्व चिंता त्या लक्ष्मीपतीवर सोडून देऊन कधी ‘आवडीने आणि भक्तीभावाने’ केवळ नामस्मरण केले आहे का?

– क्रमशः श्लोक ७३ आणि ७४

© श्री विश्वास देशपांडे

चाळीसगाव

प्रतिक्रियेसाठी ९४०३७४९९३२

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – चित्रकाव्य ☆ सारे आहे गैर…! ☆ नीलांबरी शिर्के ☆

नीलांबरी शिर्के

?️?  चित्रकाव्य  ?️?

 

☆ सारे आहे गैर नीलांबरी शिर्के 

सत्यवान कापे

वड फांदी जेंव्हा

तुटूनिया फांदी

पडे खाली तेंव्हा!!

*

यमराज आले

नेण्या त्याचे प्राण

सावित्री आडवी

उभी राहे येऊन !!

*

तुटलेली फांदी

तिचे झाले काय ?

हळूहळू फांदी

होते मृतप्राय !!

*

मेलेल्या फांदीचे

पुजन करता

सावित्रीचे पुण्य

कसे येईल म्हणता !!

*

फांदी तोडोनिया

कुणी पुजन करता

व्रत केले यैसे

कसे येईल म्हणता !!

*

वृक्षाचा संहार

पुजा उपचार

कधी समजेल

सारे आहे गैर !!

©  सुश्री नीलांबरी शिर्के

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /मंजुषा मुळे/गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – चित्रकाव्य ☆ मिसिंग लिंक! ☆ श्री प्रमोद वामन वर्तक ☆

श्री प्रमोद वामन वर्तक  

?️?  चित्रकाव्य  ?️?

? मिसिंग लिंक! ?  श्री प्रमोद वामन वर्तक ☆

मि सिंग लिंकची लिंक

 काल तुटली अतिवृष्टीने 

 गार प्रवास बोगद्यातला 

 थांबला दरड कोसळल्याने

*

सिं हावलोकन करता 

 कालच्या त्या घटनेचे 

 उदघाट्नाची घाई नडली 

 जनसामान्य वदे वाचे

*

ग रज होतीच म्हणा 

 अशा मिसिंग लींकची 

 घाट प्रवासाचा त्रास

 कायमचा टाळण्याची

*

लिं कची खराब हालत 

 काल टळली असती

 जर बोगद्यावर दरडींना

 जाळी बसवली असती

*

क माल नव तंत्रज्ञानाची 

 मिसिंग लिंकमुळे कळली 

 पण काळजी न घेतल्याने

 त्याची त्रुटी उघडी पडली

© प्रमोद वामन वर्तक

संपर्क – दोस्ती इम्पिरिया, ग्रेशिया A 702, मानपाडा, ठाणे (प.) 400610 

मो – 9892561086 ई-मेल – pradnyavartak3@gmail.com

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ कृतार्थ संध्या… ☆ श्री शरद कुलकर्णी ☆

श्री शरद कुलकर्णी

? कवितेचा उत्सव ?

☆ कृतार्थ संध्या… ☆ श्री शरद कुलकर्णी ☆

बुडताना सूर्य कोणी

फुलवात लावली होती.

 

व्याकूळ काळजात जशी ही

सांज तेवली होती.

 

क्षितिजावर रक्तिमेच्या

काजळरेख उमटली होती.

 

परतल्या गायींच्या कंठी

घंटीच निनादत होती.

 

उडवीत धूळ थोडी

सांज डोहात उतरली होती.

 

कवितेतील हरवली अक्षरे

कावरीबावरी झाली होती.

 

गहिवरल्या प्रार्थनीय समयी

मीही पापणी मिटली होती.

 

आणिक एक संध्या ह्रदयी

कृतार्थ झाली होती.

 

© श्री शरद  कुलकर्णी

मिरज

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ मनाचे श्लोक – एक सार्वकालिक ‘मनोपनिषद’… – श्लोक ७१ आणि ७२ ☆ श्री विश्वास देशपांडे ☆

श्री विश्वास देशपांडे

? इंद्रधनुष्य ?

☆ मनाचे श्लोक – एक सार्वकालिक ‘मनोपनिषद’… – श्लोक ७१ आणि ७२ ☆ श्री विश्वास देशपांडे ☆

श्लोक क्र. ७१ – – 

जयाचेनि नामें महादोष जाती।

जयाचेनि नामें गती पाविजेती।

जयाचेनि नामें घडे पुण्यठेवा।

प्रभाते मनी राम चिंतीत जावा।। ७१।।

अर्थ :  भगवंताच्या नामस्मरणाने मोठमोठी पापे नाहीशी होतात. साधकाला उत्तम अवस्था प्राप्त होते. पुण्याचा संचय होत जातो. असे सर्व काही ज्यामुळे प्राप्त होते त्या भगवंताचे नामस्मरण आणि चिंतन पहाटेच्या वेळी करावे.

(महादोष – मोठमोठी पापे/पातके/दोष, गती – अवस्था/मुक्ती/मोक्ष)

विवेचन : भगवंताच्या नामाचा महिमा अपार आहे. सतत नामस्मरण केल्याने महादोष म्हणजे महापापे नाहीशी होतात. भगवंतांचे नाम आपले अंतःकरण शुद्ध करते. वाईट गोष्टी, पापकर्म करण्याची इच्छाच होत नाही. चोरी करणे, खोटे बोलणे, व्यभिचार करणे, हत्या करणे, अपेयपान (दारू)करणे या सारख्या गोष्टी या महापाप मानल्या जातात. परंतु सतत भगवंताचे नाम घेत राहिल्याने या गोष्टी करण्याची इच्छाच नाहीशी होते. व्यक्ती सदाचारी बनते. वाल्या कोळ्याचे उदाहरण आपल्या सर्वांना माहिती आहे. वाटमारी करणे, हत्या करणे यासारखी महापापे त्याच्या हातून घडली होती. परंतु महर्षी नारद आणि ऋषींच्या उपदेशामुळे त्याच्यात अंतर्बाह्य बदल झाला. आपल्या कर्माचा पश्चाताप होऊन त्याने रामनामाचा आश्रय घेतला. रामनामाची जादू एवढी मोठी आहे की वाल्या कोळ्याचे रूपांतर महर्षी वाल्मिकीत झाले. रामायणासारखा अद्वितीय ग्रंथ लिहून ते जगासाठी वंदनीय ठरले.

रामनामामुळे गती म्हणजे उत्तम अवस्था प्राप्त होते. अंतकाळी भगवंताचे नाम मुखात येणे यासारखे भाग्य नाही. ‘ अंते मती सा गती: ‘ असे म्हटले जाते ते यामुळेच. शेवटचा दिस गोड व्हावा असे तुकाराम महाराज म्हणतात याचा अर्थ हाच आहे. पण आयुष्याच्या अखेरच्या क्षणी माणसाच्या मुखात अचानक रामनाम येत नाही. त्यासाठी सतत मनाने भगवंताचे नामस्मरण करण्याची सवय असावी लागते. ही सवय असेल तरच अंतकाळी भगवंत आठवतो.

समर्थ तिसऱ्या ओळीत म्हणतात की नामाच्या योगाने पुण्यठेवा घडतो म्हणजे वाढतो. बँकेतील आपल्या खात्यात आपण बचत म्हणून थोडे थोडे पैसे टाकत राहतो. यात सातत्य असले तर ही पुंजी वाढत जाते. मुद्दलावरही व्याजही लागू होते. रामनाम ही तर अत्यंत मौल्यवान ठेव ! थोडीथोडी जमा करत गेलो की पुण्यसंचय वाढत जातो. संत मीराबाई म्हणतात, ” पायो जी मैने रामरतन धन पायो… ” हे असं अमोलिक धन आहे की ” खर्च न खुटे, चोर न लुटे. ” इतर धन खर्चल्याने संपतं. पण याची महती काही वेगळीच. हे तर दिवसेंदिवस वाढतच जातं. विशेष म्हणजे हे धन असं आहे की याला चोरही लुटू शकत नाही. सातत्याने रामनाम घेणाऱ्याचा पुण्यसंचय वाढतच राहतो.

नामस्मरणाने वासनांचा क्षय होतो. म्हणजे भगवंत प्राप्तीखेरीज इतर वासना हळूहळू नष्ट व्हायला लागतात. शेवटी केवळ भगवंत प्राप्तीची इच्छा उरते. आपल्या पुण्यसंचयानुसार ती या जन्मी किंवा पुढील जन्मी भगवंत नक्की पूर्ण करतो. तेव्हा हे मना, प्रभात समयी श्रीरामाच्या रूपगुणांचे चिंतन कर. दिवसभरही त्याचे नित्य स्मरण ठेव. हे नाम तुला मोक्षाकडे घेऊन जाईल.

स्वसंवाद ::

१. मी रोज माझ्या बँक खात्यातील शिल्लक (Balance) तपासतो, पण माझ्या खात्यात ‘पुण्यठेवा’ किंवा रामनामाची पुंजी किती जमा होत आहे, याचा हिशेब ठेवतो का ?

२. “शेवटचा दिस गोड व्हावा” असे मला वाटते, तर मग शेवटच्या क्षणी ते नाम सहज मुखात यावे म्हणून मी आजपासूनच अंतःकरणाला तशी सवय लावत आहे का?

३. माझ्या हातून कळत-नकळत होणारे छोटे-मोठे दोष किंवा वाईट विचार दूर व्हावेत म्हणून मी नामस्मरणाचा आधार घेतो का?

४. मीराबाईंनी म्हटल्याप्रमाणे, मला हे ‘अमोलिक धन’ मिळवण्याची खरी आस लागली आहे का की अजूनही चोरांनी लुटल्या जाणाऱ्या नश्वर धनामागेच धावत आहे ?

==========

श्लोक क्र. ७२ – – 

न वेचे कदा ग्रंथीचे अर्थ काही।

मुखे नाम उच्चारिता कष्ट नाही।

महा घोर संसार शत्रू जिणावा।

प्रभाते मनी राम चिंतीत जावा।। ७२।।

अर्थ : रामनाम घेण्यासाठी पदरचे पैसे खर्च करावे लागत नाहीत. मुखाने रामनाम घेताना काही कष्ट पडत नाहीत. या रामनामाच्या साहाय्याने अत्यंत कठीण अशा संसाररूपी शत्रूवर मात करता येते. त्यासाठी प्रभात समयी श्रीरामाचे चिंतन करावे.

(न वेचे – खर्च करावे लागत नाहीत, ग्रंथीचे – पदरचे, अर्थ – पैसा, घोर – कठीण, जिणावा – जिंकावा)

विवेचन :  माणसाची देहबुद्धी फार प्रबळ असते. देहासाठी आणि देहाच्या सुखासाठी जे जे लागेल, ते मिळवण्याच्या प्रयत्नात माणूस असतो. सगळी ऐहिक सुखे उपभोगण्यासाठी पैशाची मोठी गरज असते. त्यामुळे माणूस पैशाला फार जपतो. प्रसंगी देहापेक्षाही पैशाला महत्व देणारी माणसे व्यवहारात पाहायला मिळतात. आपल्या शरीराकडे दुर्लक्ष करून ती पैसा मिळवण्याच्या मागे लागलेली असते. सामान्य माणूस स्वतःच्या मौजमजेसाठी हवे तेवढे पैसे खर्च करायला तयार असतो पण दानधर्माची वेळ आली की हात आखडता घेतो. सर्वसामान्य माणसांची ही मानसिकता समर्थ उत्तम प्रकारे जाणून आहेत. म्हणून रामनाम घेण्याबद्दल ते सांगतात की यासाठी पदरचा एक पैसाही खर्च करावा लागत नाही. वरील ओळीचा अर्थ आणखी एका प्रकारे घेता येईल. ते म्हणजे भगवंत प्राप्तीसाठी वेगवेगळे ग्रंथ वाचून त्यांचा अर्थ समजून घेण्याचा प्रयत्न सामान्य माणूस करतो. आपली पारमार्थिक बैठक तयार होण्यासाठी आवश्यक त्या ग्रंथांचे वाचन अवश्य करावे. पण तेवढे झाल्यानंतर अधिक ग्रंथ वाचण्यात वेळ न घालवता नामस्मरण करावे. नामस्मरणासाठी ग्रंथ वाचनाची आवश्यकता नाही. संत तुकाराम महाराज म्हणतात, “वेदांचा तो अर्थ आम्हासीच ठावा, येरांनी वाहावा भार माथा… “नुसते पुस्तकी ज्ञान किंवा शब्दपांडित्य महत्त्वाचे नसून, भगवंताच्या नामाची अनुभूती घेणे आणि अंतःकरणात भक्ती बाळगणे हेच वेदांचे खरे सार आहे हेच तुकाराम महाराजांना या ठिकाणी सांगायचे आहे.

दुसरी गोष्ट अशी की हे रामनाम मुखाने घेण्यास कोणतेही कष्ट पडत नाही. इतर तपसाधनेत तरी देहाला कष्ट पडतात. त्याचप्रमाणे तीर्थयात्रा वगैरे करायची म्हटले तरी देहाला कष्ट घ्यावेच लागतात. पदरचा पैसा खर्च करावा लागतो. पण रामनाम घेण्यासाठी यातील काहीही करावे लागत नाही. फक्त आपली इच्छा मात्र हवी. त्यासाठी स्वतंत्र वेळ देण्याची आवश्यकता नाही. सर्व संतांनी आपापली कामे करताना मुखाने हरिनामाचा जप सुरु ठेवला होता. आपणही आपली नित्यकर्मे करताना वाचेने किंवा मनाने भगवंताचे नाम घेऊ शकतो.

आपण सामान्य माणसे ! संसारात अडकलेलो असतो. बांधले गेलेलो असतो. पण हे बंधन दिसत नाही आणि कळतही नाही. आपले आयुष्य शेवटपर्यंत संसारासाठी धावाधाव करण्यातच जाते. शेवटी एक वेळ अशी येते की आपण हे सगळे कोणासाठी आणि कशासाठी केले असे वाटून पश्चाताप होतो. पण तेव्हा वेळ निघून गेलेली असते. संसार म्हणजे विवाहित माणसाचा पती, पत्नी, मुले, नातेवाईक असा साधारण अर्थ आपण घेतो. पण जो माणूस जन्माला आला तो या संसारात अडकला. मग तो विवाहित असो वा अविवाहित. एका संसार या शब्दाचा व्यापक अर्थ हे जग असाही आहे. जीवनाबद्दल एका हिंदी गीतात फार सुंदर ओळी आहेत. ‘ संसार हैं एक नदिया, दु:ख सुख दो किनारे हैं, ना जाने कहाँ जाए हम बहते धारे हैं… ‘अशा या संसाररूपी नदीतून तरून जायचं असेल तर रामनामाशिवाय तरणोपाय नाही.

संसार गोड वाटतो, जिव्हाळ्याचा वाटतो पण तो आपला मोठाच शत्रू आहे हे लक्षात येत नाही. ते लक्षात येते तेव्हा आयुष्याची किंमत आपण मोजलेली असते. एखाद्या गोष्टीचे माणसाला जेव्हा व्यसन लागते, तेव्हा ती गोष्ट त्याला अती प्रिय होते. मग ती वाईट आहे हे कळले तरी ती त्याला सोडवत नाही. तंबाखू, दारू इ. चे व्यसन लागलेल्यांची अशीच अवस्था होते.

समर्थ श्रीरामस्तुती करताना म्हणतात, ” संसारसंगे बहू शीणलों मी, कृपा करी रे रघुराज स्वामी. ” संसार हा आपला महाशत्रू आहे हे लक्षात घेऊन वागणाऱ्याला संसार बाधत नाही. तो संसारात असतो पण साक्षीभावाने प्रपंचाकडे पाहतो. हे सगळे प्रारब्धाचे खेळ आहेत हे तो जाणून असतो. सर्वसामान्यांना तो संसारात रमलेला दिसेलही पण त्याचे चित्त भगवंताकडे असते. आपण बसने किंवा रेल्वेने प्रवास करीत असतो. काहीवेळा सोबत असलेल्या सहप्रवाशांशी आपल्या छान गप्पा होतात. पण आपले स्टेशन आले की आपल्याला उतरावे लागणार हे आपण जाणून असतो. त्यामुळे त्या सहप्रवाशाना सोडून जाताना विशेष दुःख होत नाही. असेच आपण संसारातही असावे. पाण्यात राहूनही चिखलापासून अलिप्त असणाऱ्या कमलदलांप्रमाणे ! हे सगळे सांगणे सोपे पण आचरणे कठीण आहे. पण रामनाम घ्यायला तर सुरुवात करू या. तेव्हा हे मना, अधिक वेळ दवडू नकोस. प्रभात समयापासून भगवंताचे चिंतन कर असेच समर्थ आपल्याला या श्लोकातून सांगू इच्छितात.

स्वसंवाद :: 

१. ज्या ऐहिक सुखांसाठी आणि पैशासाठी मी रात्रं-दिवस देह झिजवतो, ते सुख मला कधी चिरंतन शांतता देऊ शकेल का?

२. नामस्मरणासाठी पैशांचा खर्च नाही आणि देहाला कष्टही नाहीत, तरीही मी ते टाळण्यासाठी वेळेचे किंवा थकव्याचे निमित्त शोधतो का?

३. संसारातील नाती आणि कर्तव्यांमध्ये मी इतका गुरफटलो आहे का, की मला या सगळ्याकडे ‘साक्षीभावाने’ किंवा अलिप्तपणे पाहता येत नाहीये?

४. पाण्यात राहूनही चिखलापासून अलिप्त राहणाऱ्या कमळाप्रमाणे, मी संसारात राहूनही माझे चित्त भगवंतचरणी ठेवण्याचा प्रयत्न करतो का?

– क्रमशः श्लोक ७१ आणि ७२

© श्री विश्वास देशपांडे

चाळीसगाव

प्रतिक्रियेसाठी ९४०३७४९९३२

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ जगणं… – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – सुचिता पंडित ☆

सुचिता पंडित

? वाचताना वेचलेले ?

☆ जगणं– लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती –  सुचिता पंडित ☆

 येईल साठी, येईल सत्तरी

 करायची नाही कुणीच चिंता,

 प्रत्येक दिवस मजेत जगायचा

 वाढवायचा नाही अपेक्षांचा गुंता.

*

 वय झालं म्हातारपण आलं,

 उगाच कोकलत बसायचं नाही.

 विनाकारण बाम लावून,

 चादरीत तोंड खुपसायचं नाही.

*

 तुम्हीच सांगा छंद जोपासायला,

 वयाचा संबंध असतो का ?

 रिकामटेकडं घरात बसून

 माणूस आनंदी दिसतो का ?

*

 पोटा-पाण्यासाठी पोरं-सुना

 घर सोडून जाणारच,

 प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये

 असे रितेपण येणारच.

*

 करमत नाही करमत नाही

 सारखे-सारखे म्हणायचे नाही,

 आवडत्या कामात दिवस घालवायचा

 उगाचच कुढत बसायचं नाही.

*

 घरातल्या घरात वा बागेत

 हिंडाय-फिरायला जायचं,

 वय जरी वाढलं असलं तरी

 मनपसंत गाणं मनमोकळं गायचं.

*

 गुडघे गेले, कंबर गेली

 नेहमी नेहमी कण्हायचं नाही,

 आता आपलं काय राहिलं?

 हे फालतू वाक्य कधीच म्हणायचं नाही.

*

 पिढी दर पिढी चालीरीतीत

 थोडे फार बदल होणारच,

 पोरं-पोरी त्यांच्या संसारात

 कळत नकळत गुंतणारच.

*

 तू-तू, मै-मै, जास्त अपेक्षा

 कुणाकडूनही करायची नाही,

 मस्तपैकी जगायचं सोडून

 रोज थोडं थोडं मरायचं नाही.

*

 स्वत:च स्वत:ला समजवायचं असतं

 पुढे पुढे चालत राहायचं असतं,

 वास्तू ‘तथास्तु’ म्हणत असते

 हे उमजून निरामय जगायचं असतं.

लेखक:अज्ञात

प्रस्तुती: सुचिता पंडित

 ≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ विजय साहित्य # ३०१ – निघाली पालखी…! ☆ कविराज विजय यशवंत सातपुते ☆

कविराज विजय यशवंत सातपुते

? कवितेचा उत्सव # ३०१ – विजय साहित्य ?

☆ निघाली पालखी…! कविराज विजय यशवंत सातपुते ☆

(संत तुकाराम महाराज पालखी सोहळा)

( सहाक्षरी रचना )

इनाम दाराचा

सोडूनीया वाडा

निघाली पालखी

सवे गावगाडा ..! १

*

आकुर्डी गावच्या

विठू मंदीरात

तुकोबा पालखी

थांबे गजरात ..! २

*

पुण्य नगरीत

स्वागत सन्मान

जागोजागी चाले

अन्न वस्त्र दान ..! ३

*

पालखी विठोबा

पुण्यनगरीत

निवडुंग्या विठू

रमे पालखीत..! ४

*

लोणी काळभोर

रंगलासे मेळा

सोलापूर मार्गी

हरीनाम वेळा..! ५

*

तुकोबा पालखी

यवत मुक्काम

दिंड्या पताकांत

निनादते धाम ..! ६

*

वरवंड गावी

पालखी निवास

आषाढी वारीचा

 सुखद प्रवास ..! ७

*

आनंदाचा कंद

गवळ्याचे नाव

रंगले वारीत

उंटवडी गाव…! ८

*

मंगल पवित्र

क्षेत्र बारामती

कैवल्याची वारी

सुखाच्या संगती …! ९

*

सणसर गावी

विठ्ठल जपात

रंगली पालखी

हरी कीर्तनात…! १०

*

आंथुर्णे गावात

घेताच विसावा

माय माऊलीत

विठ्ठल दिसावा…! ११

*

गोल रिंगणाचा

बेळवंडी थाट

निमगावी क्षेत्री

केतकीची वाट..! १२

*

इंदापुर येता

गण गवळण 

रिंगणाचे वेध

अभंगात मन…! १३

*

सुमनांची वृष्टी

सराटी गावात

अमृताची गोडी

विठ्ठल नामात..! १४

*

गोल रिंगणाचे

अकलूज गांव

मनामधे जागा

विठू भक्तीभाव…! १५

*

येता बोरगाव

दिंडी नाचतसे

काया वाचा मनी

विठू राहतसे…! १६

*

पिराची कुरोली

शिगेला गजर

पाहण्या पंढरी

पोचली नजर..! १७

*

वाखरी गावात

मिलनाची वेळा

रमला वारीत

वैष्णवांचा मेळा..! १८

*

कळस दर्शंनी

पाऊले अधीर

काया वाचा मनी

धरवेना धीर..! १९

*

दोहो पालख्यांचा

वाखरीत मेळ

विठू दर्शनाची

यथोचित वेळ…! २०

*

वैष्णवांची वारी

हरीनाम घोष

वारीचा सोहळा

परम संतोष…! २१

*

पोचल्या पालख्या

पंढरपुरात

आनंदला विठू

भक्तीच्या सुरात..! २२

*

निघाली पालखी

कैवल्य भरारी

विठूच्या सेवेत

पंढरीची वारी…! २३

© कविराज विजय यशवंत सातपुते

सहकारनगर नंबर दोन, दशभुजा गणपती रोड, पुणे.  411 009.

मोबाईल  8530234892/ 9371319798.

≈ संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ पाऊस… ☆ उज्वला सुहास सहस्रबुद्धे ☆

उज्वला सुहास सहस्रबुद्धे

☆ पाऊस… ☆ उज्वला सुहास सहस्रबुद्धे ☆

 वाट पाहते पागोळीची,

 छपरावरून येईल कधी!

टप् टप् टप् टप् ध्वनी त्याचा,

 कानामध्ये घुमेल कधी? …

 मृग नक्षत्राची चाहूल लागली,

 पण येणे तुझे झाले नाही!

पावसा पावसा ये लवकर,

 तुजविण आमचे जीवन नाही! … २

 *

येतोस जेव्हा तू भरभरून,

 कळत नाही आम्हा किंमत तुझी!

 तुझ्या विना जेव्हा जगतो आम्ही,

 विरहातून जाणीव होई तुझी! … ३

 *

ऋतुचक्राच्या फेऱ्यामधले,

 तुझेच आहे मोठे स्थान!

 तू आलास तर ऐकणार आम्ही,

 तुझे मधुर ते निसर्ग गान! .. ४

© उज्वला सुहास सहस्रबुद्धे

वारजे 

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ मला समजलेली संत तुकारामांची अभंग गाथा… पंढरीचे वर्णन – भाग – २८ ☆ अरुणा मुल्हेरकर ☆

अरुणा मुल्हेरकर

? विविधा ?

☆ मला समजलेली संत तुकारामांची अभंग गाथापंढरीचे वर्णन – भाग – २८ ☆ अरुणा मुल्हेरकर ☆

पंढरीचे वर्णन

भूतलावरील वैकुंठ, पंढरपूर या श्रीक्षेत्राचे वर्णन आणि महात्म्य सांगणाऱ्या गाथेतील अभंगांचे आपले विवेचन चालू आहे. आज आणखी काही अभंग पाहूया.

पंढरपूर कसे आहे, तेथे काय काय चालते याचे वर्णन करणारा हा एक फार सुंदर अभंग पहा.

जववरी नाही देखिली पंढरी/

वर्णीशील थोऱी वैकुंठीची//

मोक्ष सिद्धी तेथे हिंडे दारोदारी/

होऊनी कामारी दीनरूप//

वृंदावन सडे चौक रंगमाळा/

अभिनव सोहळा घरोघरी//

नामघोष कथा पुराण कीर्तनी/

ओवीया कांडणी पांडुरंग//

सर्व सुख असे तेथे सर्वकाळ/

ब्रह्म ते केवळ नांदतसे//

तुका म्हणे जे न साधे सायासे/

प्रत्यक्ष ते दिसे विटेवरी//

तुकाराम महाराज भक्ताला सांगतात, ” जोपर्यंत तू पंढरपूर पाहिले नाहीस, तोपर्यंत तू वैकुंठाची थोरवी वर्णन करशील. या पंढरपुरात सिद्धी आणि मोक्ष सांगकामे(कामारी) होऊन दारोदार दीनपणे हिंडत असतात. अर्थात ज्याचे पाय पंढरपुरास लागतात, त्याला मोक्षप्राप्ती नक्की होते. इथे घरोघरी तुळशी वृंदावने आहेत, रस्ते झाडून जागोजागी सडासंमार्जन आणि रांगोळ्या घातलेल्या दिसतात. घरोघरी अभिनव सोहळे चालू आहेत. कथा, पुराणे, कीर्तने, नामघोष होत आहेत. दळण- कांडण करताना स्त्रिया पांडुरंगाला आळवून ओव्या गात आहेत. या इथे सर्वकाळ सर्व सुखे असून मूर्तीमंत ब्रह्माचा वास आहे. मोठ्या कष्टाने जे प्राप्त होऊ शकत नाही, ते ब्रह्म या ठिकाणी प्रत्यक्ष विटेवर उभे आहे.

होय होय वारकरी/ पाहे पाहे रे पंढरी//

काय करावी साधने/ फळ अवघेची येणे//

अभिमान नुरे/ कोड अवघेची पुरे//

तुका म्हणे डोळा/ विठोबा बैसला सावळा//

पुढे महाराज भक्तांना सांगतात की, वारकऱ्यांनो पंढरीचे दर्शन घ्या. बाकीच्या साधनांची काही जरुरी नाही. सर्व फळ या पंढरपुरातच मिळते. अभिमान राहत नाही.

(या ठिकाणी अभिमानाचा अर्थ देहाभिमान असा आहे) सर्व मनोकामना पूर्ण होतात. डोळ्यामध्ये सावळ्या विठ्ठलाचे रूप भरून राहते, त्यामुळे सर्वत्र त्याचाच प्रत्यय येतो.

पंढरीसी जाये/ तो विसरे बाप माय//

अवघा होय पांडुरंग/ राहे धरुनिया अंग//

नलगे धन मान/ देह भावे उदासीन//

तुका म्हणे मळ/ नाशी तात्काळ ते स्थळ//

यासाठी वारकऱ्यांनो पंढरपुरी जा, तेथील पांडुरंगाचे दर्शन घेतल्यावर तुम्ही तुमचे मायबाप विसराल. याचाच अर्थ असा तुम्हाला प्रापंचिक आसक्ती राहणार नाही. तुम्ही स्वतःच पांडुरंग रुपी व्हाल आणि त्याच स्थितीत राहाल. कसलाच अभिमान न राहता तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होतील. धनद्रव्य, मानसन्मान याची इच्छा तुमच्या ठिकाणी राहणार नाही, कारण देहाविषयी तुम्ही उदास व्हाल. पंढरपूर हे क्षेत्र त्रिगुणरूपी मळाचा विनाश करणारे आहे.

पंढरीचा महिमा कसा अगाध आहे, याचे वर्णन तुकाराम महाराज या खालील अभंगात करतात.

पंढरीस दुःख न मिळे ओखदा/

प्रेम सुख सदा सर्वकाळ//

पंढरपुरात निरंतर पांडुरंगाचे प्रेम सुख असल्यामुळे दुःख औषधालाही (ओखदा) मिळत नाही.

पुंडलिके हाट भरियेली पेठ/

अवघे वैकुंठ आणियेले//

पंढरपुरीची पेठ भक्त पुंडलिकाने वसविली असल्यामुळे त्याने तेथे संपूर्ण वैकुंठ आणले आहे.

उदीमासी तुटी नाही कोणा हाणी/

घेउनिया धणी लाभ घेती//

या ठिकाणी व्यापार-उदीमात खोट कधीच येत नाही. नुकसान जराही नसून फायदाच फायदा आहे.

पुरले देशाशी भरले सिगेसी/

अवघी पंचक्रोशी दुमदुमित//

या पेठेत विठ्ठल हाच माल आहे. देशाला पुरेल एवढा माल शिगोशीग भरला आहे. पंढरीची पंचक्रोशी अशी या मालाने दुमदुमून गेली आहे.

तुका म्हणे संता लागलीसे धणी/

बैसले राहोनी पंढरीस//

सर्व संतांना येथे फार तृप्ती, समाधान लाभले आहे. कारण विठू माऊली त्यांना भेटली आहे, म्हणून ते पंढरीतच वास करून राहिले आहेत.

सुरवर येती तीर्थे नित्य काळ/

पेठ त्या निर्मळ चंद्रभागा//

साक्षभूत नव्हे सांगितली मात/

महिमा अत्यद्भूत वर्णवेना//

पंचक्रोशीमाजि रीघ नाही दोषा/

जळती आपैसा अघोर ते//

निर्विषय नर चतुर्भुज नारी/

अवघा घरोघरी ब्रह्मानंदू//

तुका म्हणे ज्यापे नाही पुण्यलेश/

जारे पंढरीस घेई कोटी//

चंद्रभागारुपी ही पेठ अतिशय शुद्ध आहे म्हणून इथे देवही येतात आणि सारी तीर्थेही येतात. ही गोष्ट नुसती ऐकीव नाही किंवा सांगोवांगी नाही तर प्रत्यक्ष अनुभवलेली आहे असे तुकाराम सांगत आहेत. या पेठेचा अद्भुत महिमा वर्णन करण्यास शब्द नाहीत.

या पंचक्रोशी मध्ये कोणत्याही दोषांना प्रवेश नाही. संचितात जे काही मोठे दोष असतील ते येथे आपोआप गळून जातात. या ठिकाणी स्त्रिया- पुरुष चतुर्भुज निर्विषय देवाप्रमाणे विषयहीन आहेत. त्यांच्या काम- वासना जळून गेल्या आहेत. घरोघरी ब्रह्मानंद आहे. ज्यांच्यापाशी पुण्याचा लवलेश नाही, त्यांनी पंढरीस जाऊन लागेल तेवढे पुण्य प्राप्त करून घ्यावे.

या अभंगात तुकाराम महाराज काय सांगतात?

अवघीच तीर्थे घडली एक वेळा/

चंद्रभागा डोळा देखिलिया//

अवघीच पापे गेली दिगंतरी/

वैकुंठ पंढरी देखिलिया//

अवघिया संता एक वेळा भेटी/

पुंडलिक दृष्टी देखिलिया//

तुका म्हणे जन्मा आल्याचे सार्थक/

विठ्ठलची एक देखिलिया//

ज्याने चंद्रभागेचे दर्शन घेतले, त्याला सकल तीर्थांचे स्नान घडले. एवढे हे दर्शन पुण्यकारक आहे. भूतलीचे हे वैकुंठ, पंढरपूर पाहिले असता सर्व पातके नाहीशी होतात, दिगंतरात जातात. एका पुंडलिकाचे दर्शन घेतले की सर्व संतांच्या दर्शनाचा लाभ होतो आणि एका विठ्ठलाचे दर्शन घेतल्याने आपण जन्माला आल्याचे सार्थक होते.

असा आहे हा पंढरीचा महिमा. चला तर मग पंढरीसी जाऊ /विठू माऊलीला/

डोळा भरू पाहू//

क्रमशः… २८

© अरुणा मुल्हेरकर 

डेट्राॅईट (मिशिगन) यू.एस्.ए.

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर ≈

Please share your Post !

Shares