मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ माझी माय मराठी… + संपादकीय निवेदन – सौ. दीप्ती कुलकर्णी – अभिनंदन ☆ सम्पादक मंडळ ई-अभिव्यक्ति (मराठी) ☆

सूचना/Information 

(साहित्यिक एवं सांस्कृतिक समाचार)

सौ. दीप्ती कुलकर्णी

💐 अ भि नं द न 💐

महाराष्ट्र साहित्य परिषद, इचलकरंजी आणि रोटरी क्लब ऑफ इचलकरंजी यांनी आयोजित केलेल्या काव्यस्पर्धेत आपल्या समुहातील ज्येष्ठ साहित्यिका श्रीमती दीप्ती कुलकर्णी यांना त्यांच्या ‘माझी माय मराठी’ या कवितेला उत्तेजनार्थ पुरस्कार प्राप्त झाला आहे.

श्रीमती कुलकर्णी यांचे ई-अभिव्यक्ती परिवारातर्फे मन: पूर्वक हार्दिक अभिनंदन आणि शुभेच्छा 💐

 आज त्यांची पुरस्कार प्राप्त कविता प्रकाशित करत आहोत.

संपादक मंडळ

ई अभिव्यक्ती मराठी

पुरस्कार प्राप्त कविता

? कवितेचा उत्सव ?

☆ “माझी माय मराठी” ☆ सौ. दीप्ती कुलकर्णी ☆

(काव्यप्रकार:अष्टाक्षरी)

 माझी ही माय मराठी

अभिमाने येते ओठी||धृ||

हर्षे कविताही येते

गीते नि भारुड गाते

पोवाड्यात ही रमते

ओव्यातुनी ती सजते ||||

 *

विश्वी कथेच्या फुलते

शब्दा लेते नि खुलते

वास्तवास न्याय देते

आविष्कारे ती नटते ||||

 *

कधी कादंबरी बने

शब्दांसवे ती डोलते

वेधकता  दाखविते

सर्वां काबिज करते ||||

 *

लालित्येही ती मांडते

 संवादाने ती नटते

तेजोन्मेषे नि पांडित्ये

मोहिनीच ती घालिते ||||

 *

सारस्वता जी स्फुरते

नाट्यातुनी प्रगटते

नवरसा दाखविते

विश्वासह ती स्पर्शते ||||

© सौ. दीप्ती कुलकर्णी

भ्र. ९५५२४४८४६१

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ अथांग मुक्तधारा… कवयित्री : राजश्री पाटील ☆ प्रस्तुती – श्री सुनीत मुळे ☆

श्री सुनीत मुळे

? वाचताना वेचलेले ?

☆ अथांग मुक्तधारा… कवयित्री : राजश्री पाटील ☆ प्रस्तुती – श्री सुनीत मुळे 

प्रत्येकालाच कुठे जमते

सहज सुंदर बरसणे

​मनातली ओल जपत

पाऊस होऊन जगणे

 

​तो येतो तसाच

कोणताही मुखवटा न घालता

​धरेच्या कुशीत विरतो

स्वतःचे अस्तित्व न राखता

 

​आपण मात्र जगतो

हिशोबाच्या जगात भावनांच्या

​काठोकाठ भरूनही दाटतात

भिंती कोरड्या अहंकाराच्या

 

​पावसाकडे नसते कधी

भेदाभेदाची कोणतीच पट्टी

​तो सुवर्णमहालावरही बरसतो

आणि गरिबाच्या झोपडीवरही

 

​आपले प्रेम मात्र

शर्तींच्या चौकटीत अडकलेले

​माणसाचे दातृत्व नेहमी

स्वार्थाच्या तराजूत तोललेले

तो ढग होऊन येतो

आणि मुक्तहस्ते उधळतो

​आपण अमृताचा संचय करून

त्यालाच गळती लावतो

त्याच्या एका थेंबात

अंकुराचे प्राण हसतात

​आपल्या हजारो शब्दांत

नाते मात्र मुके राहतात

 

​निसर्गाचे हे देखणे रूप

कधीतरी माणसाला उमजावे

​पावसासारखे निखळ होऊन

फक्त देता देता उरावे…

कवयित्री : प्रा. राजश्री पाटील

प्रस्तुती : सुनीत मुळे

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – चित्रकाव्य ☆ चिगोरात तिंतिणी ही… ☆ रेणुका धनंजय मार्डीकर ☆

रेणुका धनंजय मार्डीकर

?️?  चित्रकाव्य  ?️?

? चिगोरात तिंतिणी ही… ? रेणुका धनंजय मार्डीकर ☆

(भावगीत (वर्ण संख्या १६ यति ८ व्या अक्षरावर))

वसंताने आणलेली ग्रीष्मात बहरू येते 

चिगोरात तित्निणी ही रंगरूप नवे घेते ||ध्रु||

*

चिमण्याश्या लाल कळ्या पर्ण पाचूत सजल्या

सोनं पांढऱ्या पाकळ्या फुलोऱ्यात त्या रुजल्या

पाकळ्यांना छेडण्यास मधमाशी डंख देते

चिगोरात तिन्तिणी ही रंगरूप नवे घेते ||१||

*

दीर्घायुषी तरूवर दिसतात मनोहर

हरितपर्णिकामधे सजे फुलोरा सुंदर

चिंचबने फुलारली मोहक दिसती शेते

चिगोरात तिन्तिणी ही रंगरूप नवे घेते ||२||

*

कधी वाटे भरजरी अंगावरली शेलारी

शालू नेसून नवरी नटलेली दिसे न्यारी

गीत सुमधूर माझे चिंचेखाली मला नेते

चिगोरात तिन्तिणी ही रंगरूप नवे घेते ||३||

*

चिरमिर पानांच्या या अक्षताच पडतात

फुलोऱ्याची फुले त्यात पायघड्या घालतात 

छोटे छोटे डोकावती अम्लकीचे आकडे ते

चिगोरात तिन्तिणी ही रंगरूप नवे घेते ||४||

© रेणुका धनंजय मार्डीकर

औसा.

मोबा. नं.  ८८५५९१७९१८

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित / मंजुषा मुळे/ गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – चित्रकाव्य ☆ शिवार पंढरी… ☆ डॉ.सोनिया कस्तुरे ☆

डॉ. सोनिया कस्तुरे

?️?  चित्रकाव्य  ?️?

? – “शिवार पंढरी…” – ? ☆ डॉ.सोनिया कस्तुरे ☆

मोटेचा आवाज | प्रवाह पाटाचा 

झुळूका वाऱ्याचा | पांडुरंगा ||१||

*
कांदा मुळा भाजी | गाते हिरवाई 

आमुची विठाई | काळी माय ||२||

*

टाळ मृदुंग ना | साथीला चिपळी 

औत बैल गळी | तालामध्ये ||३||

*

चंद्रभागा माझी | नाचते शिवारी

शिवार पंढरी| भासे जणू ||४||

*

वारी चालू वाटे | भेटावया तुला

म्हैस बैल गाया  |  साद घाली ||५||

*

सौख्य पंढरीचे | शिवारी खुलते

तुकोबा मनी ते | जनाबाई ||६||

*

पावसाच्या सरी | ओंब्या धान्य धरी

इथेच पंढरी | विसावली ||७||

*

सोनिया म्हणे हा | विठू मी पाहिला 

शिवारी थाटला | निसर्गात ||८||

© डॉ.सोनिया कस्तुरे

विश्रामबाग, जि. सांगली

भ्रमणध्वनी:- 9326818354

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मराठी कविता ☆ कवितेच्या प्रदेशात # ३२२ ☆ गझल – सूर ना सोसे तिला… ☆ प्रभा सोनवणे ☆

प्रभा सोनवणे

? कवितेच्या प्रदेशात # ३२२ ?

☆ गझल – सूर ना सोसे तिला ☆  प्रभा सोनवणे ☆

चूल होती छान, आता धूर ना सोसे तिला

चांदराती आसवांचा पूर ना सोसे तिला

*

ही अशी साधी घरे आहेत का गावाकडे?

 कंदिलाचा मंदसा तो नूर ना सोसे तिला

*

पुस्तके कोरी नवी ,अभ्यास करती बालके

 गोंधळाचा कोणताही सूर ना सोसे तिला

*

बाप गेला माय आता एकटी पाहे घरा

रापलेला चेहरा, संतूर ना सोसे तिला

*

दप्तरांचा रंग नीळा जांभळा आहे जरी

दाटलेले अंतरी काहूर ना सोसे तिला

© प्रभा सोनवणे

१३- ७- २६

संपर्क – “सोनवणे हाऊस”, ३४८ सोमवार

पेठ, पंधरा ऑगस्ट चौक, विश्वेश्वर बँकेसमोर, पुणे 411011

मोबाईल-९२७०७२९५०३,  email- sonawane.prabha@gmail.com

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) –  उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित / मंजुषा मुळे/ गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ यक्ष गान… ☆ श्री सुहास रघुनाथ पंडित ☆

श्री सुहास रघुनाथ पंडित

? कवितेचा उत्सव ?

☆ यक्ष गान... ☆ श्री सुहास रघुनाथ पंडित 

(आज आषाढ महिन्याचा पहिला दिवस. कालिदास दिन! त्यानिमित्त मेघदूताचे स्मरण.)

मनोमंडलामधे मेघ हे पहा स्मृतींचे तुझ्या दाटले

विरह वेदना साहू कशी मी असे कसे ग भोग आपले

मृगलोचन ते नजर बोलकी सांग कशी मी विसरु

कस्तुरगंधीत सुवर्णक्षण ते सांग कितीदा स्मरु

 *

सांगू तुजला कशी इथे ग वाळून जाई काया

आता इथे ग क्षणाक्षणाला तुझी आठवे माया

 *

जाणशील का ह्रदयामधल्या कोमल या भावना

विरह गीत हे गात येथ मी, येईल का तव श्रवणा

 *

भाग्यच माझे, म्हणून होते स्वप्नी तव दर्शन

धडपडते मन तशात द्याया, तुजला आलिंगन

 *

उत्सुक तुजला भेटाया पण, यावे सांग कसे

विरहव्यथेचे होईल दर्शन, जगात आणि हसे

 *

क्षणाक्षणांची युगे जाहली सरतील कधी हे दिन

तडफडते मन येथ जसे की जळावाचुनी मीन

 *

सुखद:खाचा खेळ असे हा कळते सारे जरी

विरह वेदना मनात सलते उरते ती अंतरी

 *

स्नेहबंध हे तव प्रेमाचे सुखविती माझ्या चित्ता

दुरावाच का आणिल अपुल्या प्रीतिला गाढता

© श्री सुहास रघुनाथ पंडित 

सांगली (महाराष्ट्र)

मो – 9421225491

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ श्री रविंद्रनाथ टागोर यांची “गीतांजली”… भाग – ३२ ☆ सौ.मंजिरी येडूरकर ☆

श्री मंजिरी येडूरकर

? इंद्रधनुष्य ?

☆ श्री रविंद्रनाथ टागोर यांची “गीतांजली”… भाग – ३२ ☆ श्री मंजिरी येडूरकर ☆

श्री रविंद्रनाथ टागोर

गीतांजलीतील मृत्यूची परिकल्पना…

गीतांजलीतील बहुसंख्य कवितांमध्ये मृत्यूचा उल्लेख या ना त्या प्रकारे आलेला दिसतो. याचं कारण शोधण्याचा प्रयत्न केला तर दोन शक्यता आढळतात.

पहिली शक्यता ही की, रविंद्रनाथांनी त्यांच्या तरुणपणीच, त्यांच्या अगदी जवळच्या, प्रिय व्यक्तींचे मृत्यू फार जवळून पाहिले किंवा अनुभवले म्हटलं तरी चालेल. ते फक्त १३ वर्षांचे असताना त्यांचं मातृछत्र हरपले. नंतर ते २२ वर्षांचे असताना त्यांची जिवलग मैत्रीण, त्यांचे प्रेरणास्थान असलेली, त्यांच्या साहित्याची प्रथम वाचक, श्रोता व टीकाकार असलेली त्यांची समवयस्क वहिनी, कादंबरी देवींचा अनपेक्षित व अनैसर्गिक मृत्यू रविंद्रनाथांना उध्वस्त करून गेला.

यानंतर तर काळाची वक्रदृष्टीच त्यांच्या कुटुंबावर पडली असं म्हटलं तर अतिशयोक्ती होणार नाही. त्यांची पत्नी मृणालिनी देवी ऐन तारुण्यात, पाच मुले मागे सोडून, १९०२ साली त्यांना एकटं करून गेल्या. या धक्क्यातून बाहेर येण्यापूर्वीच फक्त ९ महिन्यांच्या अंतरालानंतर, त्यांची मुलगी रेणुका टी बी च्या संसर्गामुळे अवघ्या १३ व्या वर्षी मृत्यू पावली. त्यानंतर एक वर्षाच्या आतच रविंद्रनाथांच्या वडिलांचा मृत्यू (१९०५) झाला. त्यांचा धाकटा मुलगा समींद्रनाथ ११ वर्षांचा असताना कॉलरा होऊन देवाघरी गेला (१९०७). पाठोपाठ सतीशचंद्र नावाचा त्यांचा तरूण, बुद्धिमान सहकारी, जो कलकत्त्यातील आपलं सगळं वैभव सोडून शांतिनिकेतनाच्या कार्यात रविंद्रनाथांना मदत करण्यासाठी आला होता तो अचानक वारला. अशा प्रकारे १९०२ ते १९०८ या सहा वर्षांत त्यांनी पाच जवळच्या व्यक्तींना गमावलं. यानंतर १९२३ साली बंधू सत्येंद्रनाथ व १९२५ ला बंधू ज्योतिरिंद्रनाथ स्वर्गवासी झाले.

रविंद्रनाथांना मृत्यूविषयी वाटणारा जिव्हाळा, जो त्यांच्या गीतांजलीतील कवितांमधून जाणवतो त्याचं दुसरं कारण असू शकतं, ते म्हणजे त्यांचा प्राचीन भारतीय तत्त्वज्ञानाचा अभ्यास! या अभ्यासामुळे आत्मा अमर आहे व एक शरीर नष्ट झालं तरी दुसरं शरीर धारण करून तो पृथ्वीवर येतच असतो; या जन्ममृत्यूच्या चक्रावर त्यांचा दृढ विश्वास होता व म्हणूनच या चक्राचा उल्लेख अगदी पहिल्याच कविते पासून गीतांजलीत वारंवार आलेला दिसतो.

त्यांच्यातला कवी मृत्यूला कधी घाबरत नाही किंवा टाळण्याची इच्छाही व्यक्त करत नाही, उलट तो मृत्यूचं स्वागत करताना दिसतो.

ते म्हणतात, मृत्यूला का भ्यायचं? मरण म्हणजे दोन जन्मांमधली फक्त छोटीशी विश्रांतीच तर आहे.

आपण जन्म घेऊन जसे या जगात आलो, तसेच मृत्यू नंतर दुसऱ्या जगात प्रवेश करणार असतो. ते जग आपल्याला अनोळखी असतं म्हणून भीती वाटते म्हणावं तर जन्माआधी आपल्याला हे जग तरी कुठे माहीत होतं!

ज्या परमात्म्याच्या भेटीसाठी आपण जन्मभर तळमळतो, मृत्यूनंतर त्याचा चिरंतन सहवास आपल्याला मिळू शकतो, त्याच्याशी एकरूप होण्याची संधी आपल्याला मिळू शकते. या मर्त्य जगातून त्याच्या अमर्त्य जगात आपल्याला प्रवेश मिळतो. या सगळ्याचा टागोरांना अतिशय आनंद होतो. पतीगृही निघालेल्या नव्या नवरी प्रमाणे त्यांना त्या अमर्त्य जगाबद्दल प्रचंड उत्सुकता आहे. तिकडे जाण्याबद्दल आतुरता आहे.

तरूण वयातच मृत्यूच्या तांडवामुळे भावविश्वाच्या चिंध्या झाल्यानंतर, रविंद्रनाथांच्या जीवनात मोठी पोकळी निर्माण झाली, पण मृत्यूच्या या अनुभवानेच त्यांना मृत्यू विषयी विचार करायला भाग पाडले असणार आणि मग त्यांचा मृत्यू कडे बघण्याचा दृष्टीकोनच पूर्णपणे बदलला असावा. प्रियजनांच्या कायमच्या वियोगामुळं, त्यांचं लौकिक गोष्टीत गुंतलेलं मन मुक्त झालं आणि त्यांना पटलं की मृत्यूच्या चष्म्यातून जीवनाकडं बघायला हवं तरच जीवनाचं सत्य लक्षात

येईल.

—– 

☆ गीत : ९४ ☆

AT this time of my parting, wish me good luck, my friends! The sky is flushed with the 

dawn and my path lies beautiful.

Ask not what I have with me to take there. I start on my journey with empty hands and 

expectant heart.

I shall put on my wedding garland. Mine is not the red-brown dress of the traveller, and though there are dangers on the way I have no fear in my mind.

The evening star will come out when my voyage is done and the plaintive notes of the 

twilight melodies be struck up from the King’s gateway.

—–

☆ मराठी भावानुवाद : गीत : ९४ ☆

घेऊनि तुमच्या शुभ कामना।

निरोप घेत मी जरी यातना॥

*

लाली उषेची गगन भूषवी।

वाटचाल ती रम्य भासवी॥

*

असती माझे रिक्तच हस्तक।

परी ठेविते नत मी मस्तक॥

*

मनी असे उत्सुकता भारी।

पतीदेवाच्या जाईन दारी॥

*

पाठवणीची साडी पिवळी।

हृदयी असे ती मूर्त सावळी॥

*

अज्ञाताचा प्रवास अवघड।

नसे भीती, करि तो सवघड॥

*

स्वागत करण्या तारे गगना।

सायं गीते गातील ललना॥

*

वेशीपासुनि मिरवित नेतील।

सासरी माझे कवतिक होईल॥

*

रूप सावळे पाहीन जेधवा।

विरुनि जाईन त्यांमधे तेधवा॥

भावानुवाद © मंजिरी येडूरकर 

संपर्क: ९४२१०९६६११

—– 

☆ गीत : ९५ ☆

WAS not aware of the moment when I first crossed the threshold of this life.

What was the power that made me open out into this vast mystery like a bud in the 

forest at midnight!

When in the morning I looked upon the light I felt in a moment that I was no stranger in 

this world, that the inscrutable without name and form had taken me in its arms in the form of my own mother.

Even so, in death the same unknown will appear as ever known to me. And because I 

love this life, I know I shall love death as well.

The child cries out when from the right breast the mother takes it away, in the very next moment to find in the left one its consolation.

—–

☆ मराठी भावानुवाद : गीत : ९५ ☆

कसे का अन् कधी

जगती पडले मम पाऊल कलंदर

 घनदाट अरण्यी

 माध्यान्ह रात्री

 जणू उमलते कलिका सुंदर

 शक्ती कोणती

 भक्ती कुणाची

 जी भासे मज गूढ निरंतर

 क्षणात कळले

 मज जाणवले

अनंग व्यापे मम मातेचे अंतर

 प्रिय मज जीवन

 हरीप्रीत साधून

तसाच कवळीन मृत्यू शुभंकर

 माता करविता

 दुग्धपान बालका

पयोधर ती बदले जेंव्हा तद्नंतर

 कांही क्षण त्या

 दुग्ध न मिळता

रडे मूढ ते, जीवन मिळते मृत्यू नंतर

भावानुवाद © मंजिरी येडूरकर

संपर्क: ९४२१०९६६११

—– 

☆ गीत : ९६ ☆

WHEN I go from hence let this be my parting word, that what I have seen is unsurpassable.

I have tasted of the hidden honey of this lotus that expands on the ocean of light, and 

thus am I blessed ⎯ let this be my parting word.

In this playhouse of infinite forms I have had my play and here have I caught sight of him that is formless.

My whole body and my limbs have thrilled with his touch who is beyond touch; and if the end comes here, let it come ⎯ let this be my parting word.

—- 

☆ मराठी भावानुवाद : गीत : ९६ ☆

चाललो मी चाललो

 अनंत यात्रेला॥

*

भोगिले मी भोगिले

 अत्युच्च सुखांना॥

*

चाखिला मी चाखिला

 मधु दैवी पुष्पांचा॥

*

अभिनित केली मी केली

 भूमिका त्याने दिलेली॥

*

पाहिले मी पाहिले

 रूप अरूपाचे॥

*

स्पर्शिले मी स्पर्शिले

 जे स्पर्शापार असे॥

*

रोमांचित झालो मी झालो

 अनुभूती घेतांना॥

*

त्यागिले मी त्यागिले

 मर्त्य जीवनाला॥

*

बोललो मी बोललो

 अंतिम बोलांना॥

*

चाललो मी चाललो

 अनंत यात्रेला॥

– क्रमशः भाग ३२..

मूळ इंग्लिश काव्य : श्री. रविंद्रनाथ टागोर.

भावानुवाद : कवयित्री : © सौ.मंजिरी येडूरकर

लेखिका व कवयित्री, मो – 9421096611

≈ संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ मेंदी… ☆ प्रा तुकाराम दादा पाटील ☆

श्री तुकाराम दादा पाटील

 

? कवितेचा उत्सव ?

☆ मेंदी… ☆ प्रा तुकाराम दादा पाटील ☆

हातावरची तुझ्या साजणी अजून आहे मेंदी ओली

मुरेल तितकी गडद होउनी खुलून येते छानच लाली

तुझे भेटणे ठरले तेव्हा निरोप होता तुला मिळाला

तूच मनाने अवघडलेल्या वाट पाहिली झाडा खाली

 *

झाली ओळख पहिली तेव्हा मनात होती धडकी भरली

दोघांमधले मिटवून अंतर अशीच झाली होती बोली

 *

होकाराने जुळले नाते फुलून गेलो आनंदाने

दोघांनाही तेव्हा कळले बोलायाचे हसून गाली

 *

उगी कशाला भांडायाचे रुसवे फुगवे पाळायाचे

संसाराच्या प्रगतीसाठी होतच असते बोलाचाली

 *

दोघांनीही चुका शोधल्या तिथेच झाली सारी गलती

समेटघडला क्रोध निवळला रात निवळली सुंदर झाली

 *

जगणे म्हणजे कसरत असते जीवन भर ती करत जायची

जपत जायची सर्व माणसे वावरणारी सभोवताली

 *

नकोस चिंता करत बसू तू खुशाल गावू जीवन गाणे

संसाराची खांद्यावरती पेलायाची असते डोली

 

© प्रा. तुकाराम दादा पाटील

मुळचा पत्ता  –  मु.पो. भोसे  ता.मिरज  जि.सांगली

सध्या राॅयल रोहाना, जुना जकातनाका वाल्हेकरवाडी रोड चिंचवड पुणे ३३

दुरध्वनी – ९०७५६३४८२४, ९८२२०१८५२६

≈ संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ “यश हे अमृत झाले?” ☆ वर्षा बालगोपाल ☆

वर्षा बालगोपाल 

??

☆ “यश हे अमृत झाले☆ सुश्री वर्षा बालगोपाल 

यश हे अमृत झाले सुख स्वर्गीचे आले

दिग्विजयाच्या मनोरथावर नक्षत्रांचे झुलते अंबर

मागेपुढती राजपथावर

लक्ष दीप लागले

यश हे अमृत झाले 

 *

स्तुतिसुमनांचे उधळित झेले जनगौरव तो जयजय बोले

कीर्तध्वजावर लावून डोळे भाग्य पुढे चालले

यश हे अमृत झाले 

 *

वैभव मिरवीत मंदिरी येता दिसेल डोळी ती मंगलता

सुख अंधारी मन व्याकुळता दु:ख सुखे हासले

 *

यश हे अमृत झाले

सुख स्वर्गीचे आले

परि दु:ख सुखे हासले

पुत्र व्हावा ऐसा चित्रपटातील पी सावळाराम यांचे गीत ऐकता ऐकता सुखदा आपला मुलगा सुशील याचे सायकल शिकणे आनंदाने पहात होती. सुशील अंगणात सायकल चालवायला शिकत होता. पहिल्यांदा हाफ पॅडलिंग करता करता दमून गेला. नंतर सीटवर बसण्याचा प्रयत्न करताना दोनदा तीनदा आपटला. हाताला लागलं, कपडे तर मातीत घोळून निघाले. पण तरीही जिद्दीने तो स्वतः सीटवर बसून पूर्ण पॅडलिंग करत सायकल चालवायला शिकला. तेव्हा त्याच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहण्यासारखा होता. त्याच्या चेहऱ्यावरचे तेज पाहून सूर्य सुद्धा थोडा ओशाळा झाला असेल.

अतिशयोक्तीचा भाग सोडला तर खरंच कष्टानंतर मिळालेल्या यशाचे वर्णन कितीही केले तरी कमीच असते. खरंच यश हे अमृत झालेले असते आणि त्या यशासाठी घेतलेले दुःख, झालेल्या यातना या सुद्धा सुखात परावर्तीत होतात.

त्या सुखात नकळत अजून चांगल्या गोष्टी कशा दडलेल्या असतात, तर सुशील आनंदात घरात आला. त्याने इकडे तिकडे पाहिले आणि हळूच कोणी नाही पाहून प्रथम बाथरूम गाठले. आपले कपडे पाहून आई रागवेल असे वाटून स्वतःचे कपडे स्वतः धुतले. स्वच्छ आंघोळही केली.

आई सुखदाने सगळे पाहिले होते. त्यामुळे तिने तेल हळद तयार ठेऊन खरचटलेल्या जागेवर ते लावले. लगेच गरम दूध प्यायला देऊन बेसनाचा लाडू पण दिला. आनंदाने जेव्हा सुशिलने आई आता मला सायकल येते हे सांगितले तेव्हा सुखदाने त्याला शाब्बासकी दिली. म्हणाली खरंच खूप आनंद होतोय. पण यशाहुनीही प्रयत्न सुंदर असतात बाळा.

बघ तू पडलास, तुला लागलं तरी तू प्रयत्न सोडले नाहीस जिद्द पक्की केलीस माघार घेतली नाहीस म्हणूनच तुला सायकल तर आलीच. पण आईच्या कामाची जाण येऊन तुला तुझे कपडे धुण्याइतके स्वावलंबी केले. तुला स्वच्छतेचे महत्व वाटून तुला कोणी न सांगताही आंघोळही केलीस.

जीवनातही असेच असते. भिंतीवर तोंडात खाऊ घेऊन जाणारी मुंगी पण खाली खाली घसरते, कधी पडते पण वर जाण्याची जिद्द धरून ती वर जातेच. एडिसनने हजार वेळा प्रयोग करून मग 1001 व्या वेळी ब्लबचा शोध लागला. त्यावेळी त्याच्या मुलाखतीत तो म्हणाला होता की काय केले नाही तर ब्लब लागतो हे मी वेगवेगळ्या हजार मार्गानी शिकलो. अपयश हे आपल्याला अनुभव देत असते आणि तोच मोठा गुरू होउन आपल्याला ज्ञानी करत असते.

सोहनलाल द्विवेदी यांची लहरों से डर कर नौका पार नहीं होती, कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती। ही कविता आपल्याला एक सकारात्मकता देते.

म्हणूनच यशाचा सागर पार करायचा असेल तर प्रयत्नांच्या बेटांवर विसावायला हवं. ती बेटे कदाचित पैलतीरापेक्षा अधिक सुंदर असतात.

परवाच एक जण अतिशय निराश होउन बसला होता. कारण upsc परिक्षा सलग तिसऱ्यांदा अगदी थोड्या मार्कांने नापास झाला होता. म्हणाला अपयश ही यशाची पहिली पायरी असते हे माहित होते पण येथे तर जीनाच तयार होताना दिसतोय. पण बाळा हे सुद्धा काही खोटे नसते. प्रत्येकवेळी जरी अपयश आले असे वाटत असले तरी तुम्ही यशाच्या कडे अजून थोडे पुढे गेलेला असता. यशाच्या शिखरावर जायला पायऱ्या चढयलाच हव्या. हेलिकॅप्टरने यश शिखरावर उतरणे याला काही अर्थ नसतो. तुम्ही तो जीना नजरेपुढे आणा. पहिली पायरी अपयश, दुसरी पायरी अपयश +निर्धार, तिसरी पायरी अपयश +निर्धार+प्रयत्न, चौथी पायरी अपयश +निर्धार+प्रयत्न +कष्ट, पाचवी पायरी अपयश +निर्धार+प्रयत्न +कष्ट+सातत्य, सहावी पायरी अपयश +निर्धार+प्रयत्न +कष्ट+सातत्य +सराव, सातवी पायरी अपयश +निर्धार+प्रयत्न +कष्ट+सातत्य +सराव+आत्मविश्वास, मग सातव्या पायरीनंतर यश तुमचेच असते. याचा अर्थ अपयशा नंतरपुन्हा तुम्ही तितकी अपयशे पचवण्याची मानसिकता ठेवली पाहिजे असा नाही. तर तुम्ही बाकीच्या सगळ्या पायऱ्या एका दमात सुद्धा चढू शकता आणि पुढच्या वेळेस लगेच यश मिळेलही. पण जर लगेच यश नाहीच मिळाले तर त्याने नाराज होउन प्रयत्न सोडून देण्या पेक्षा पुन्हा पुन्हा प्रयत्न करत राहिले तर यश मिळणारंच हा आत्मविश्वास हवा.

सुशिलला मनोमन पटले आणि तो सहज म्हणाला 

यशाहुनीही प्रयत्न सुंदर 

दिलेस मंत्रा जपे निरंतर 

मिळेल याने मला पुरंदर 

म्हणेल आई मला धुरंदर ||

© वर्षा बालगोपाल

मो 9923400506

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ “समिधाच सख्या या!!” – लेख क्र. १३ ☆ प्रा.भारती जोगी ☆

प्रा.भारती जोगी

? इंद्रधनुष्य ?

☆ “समिधाच सख्या या!!” – लेख क्र. १३. ☆ प्रा.भारती जोगी ☆

मृणालिनीदेवी रविंद्रनाथ टागोर 

ज्या सौंदर्याला मी फक्त माझ्या घरात पहायचो,

ते आज मला चांदण्यांत, फुलांत आणि नभात दिसते.

तू आता फक्त माझी राहिली नाहीस

तू या संपूर्ण सृष्टीचा एक भाग झालीस. 

हा वेदनेचा स्पर्श होत प्रकटलेला भावनांचा आवेगी ओघ आहे; जो…

विश्व कवी, कवी गुरू, गुरूदेव रविंद्रनाथ टागोर यांनी, आपल्या प्रिय पत्नीच्या निधनानंतर स्मरण या काव्यसंग्रहात प्रसृत करत ; प्रवाहित केला… स्मृती सुमन रुपात!! 

रवींद्रनाथांच्या वडिलांच्या टागोर इस्टेट मध्ये व्यवस्थापक असलेल्या बेनीमाधव यांची कन्या… भवतारिणी रविंद्रनाथांची पत्नी म्हणून आली त्यावेळी तिचं वय होतं ९ वर्षे… आणि रविंद्रनाथांचं वय होतं २२. लग्नानंतर तिचं नाव बदलून मृणालिनी ठेवण्यात आलं. अतिशय साध्या, ग्रामीण भागातून आलेली ही निरक्षर बालिका! एक नाजूक वेल… जी एका विराट वृक्षाच्या छायेत… त्याच्या आधारावर जगू पहाणारी.

पण तिचं भाग्य थोर की, विवाहानंतर घरचीच कामं केली पाहिजेत अशी कुणीही जबरदस्ती नाही केली. स्वतः रवींद्रनाथांनी तिला लोरे टे हाऊस या शाळेत इंग्रजी भाषा शिकायला पाठवले. पाटी-पुस्तक, गणवेश ते दाखला काढणे, हे सगळं केलं. संस्कृत भाषा शिकवायला, गृह-शिक्षक नेमला. आणि बघता-बघता… मुळातच प्रतिभावंत असलेली ही मृणालिनी… पाकळी-पाकळीने उमलंत… फुलू लागली… संपूर्ण उन्मिलित होण्यासाठी, सर्वांगाने उमलंत फुलवण्यासाठी, सुरू झालं तिचं उन्मिलन!! आणि बघता-बघता ही मृणालिनी इंग्रजी, संस्कृत, बंगाली या तिन्ही भाषांवर प्रभुत्व प्राप्त करत, पारंगत झाली. ही वेल त्या विराट वृक्षाच्या आधाराने, गगनावरी जाण्यास उत्सुक झाली.

आणि मग सुरू झाला एक अनोखा प्रवास… एका मुलीचा… अशिक्षित ते अनुवादक होण्याचा! 

लग्नाच्या वेळी निरक्षर असलेल्या मृणालिनी देवी भाषांतरकार म्हणून नावारूपाला आल्या.

प्राचीन भारतीय ग्रंथांचा सखोल अभ्यास करताना, त्यांना वाटले की, हे ज्ञान बंगाली वाचकांना ही मिळावे. म्हणून मृणालिनी देवींनी…

महाभारतातील अत्यंत क्लिष्ट आणि तत्वज्ञानाने भरलेल्या शांती पर्वाचा बंगालीत अत्यंत सोपा अनुवाद केला. अगदी ज्ञानेश्वर माऊलींच्या… ऐसी अक्षरे रसिके मेळविन… ची च आठवण आली.

इतकंच नाही तर कठोपनिषद याचे केलेले भाषांतर त्यांच्या भाषिक आणि वैचारिक प्रगती चे उत्तम उदाहरण म्हणावे!! त्यांनी अनुवादकाच्या भूमिकेतून या ग्रंथांचे सांस्कृतिक, आणि दार्शनिक महत्त्व दाखवून दिले.

मृणालिनी देवींची आपल्या पतीची ख-या अर्थानं सहचरी होण्याची ही तळमळ थेट पोहोचते आपल्या अंतरंगात!! टागोर घराण्याचा वारसा असलेल्या साहित्य, नाट्य या दोन कलांवर मृणालिनी देवींनी ही आपला स्वतः चा असा एक वेगळा ठसा उमटवला. नाटकांतून ही प्रमुख नायिकेची भूमिका केली. याशिवाय बालसाहित्य, कथा लेखन, बोधकथा लेखन ही केले.

टागोरांच्या वाड्याचा उंबरठा ओलांडून आल्यापासूनच… त्या घराण्याच्या साहित्यिक वारसा जपंत, पुढे पाऊल टाकत निघालेल्या मृणालिनी देवी जणू त्या वाटेवर मोठ्या आत्मविश्वासाने चालत राहिल्या याच विश्वासाने…

हाती अमृताचा वसा, साथ देई माझा सखा

त्याच्या कृतार्थ डोळ्यांत, झुले उंच माझा झोका…

आणि खरंच रवींद्रनाथांच्या खंबीर साथीने… आधी वयातील अंतरामुळे औपचारिक असलेलं नातं, हळूहळू एक नितांत सुंदर असं बौद्धिक, भावनिक साहचर्याचं नातं झालं! टागोरांच्या परिवरातही त्या समरस झाल्या होत्या. आपल्या अनुवादाच्या आनंदात त्या आपल्या सासुबाईंनाही सामावून घेत. म्हणुनच की काय त्याची छोटी मुलगी मीरा आपल्या डायरीत लिहिती झाली…

” शांतिनिकेतन च्या दुस-या मजल्यावरील व्हरांड्यात एक टेबललॅंम्प जळतोयं. माझ्या आईच्या हातात एक इंग्रजी कादंबरी आहे. ती वाचतीये आणि माझ्या आजी साठी अनुवाद करतीये. “

फक्त मृणालिनी देवींच्या या बौद्धिक पैलूंची इतिहासात म्हणावी तशी नोंद नाही घेतली गेली… हे जाणवतं! 

वयात खूप अंतर असुनही टागोरांच्या जीवनावर आणि कलेवर मृणालिनी देवींचा खूप प्रभाव दिसून येतो.

रविंद्रनाथ जेव्हा कामानिमित्त, प्रवासासाठी घराबाहेर असायचे तेव्हा ते मृणालिनी देवींना आवर्जून पत्रे पाठवीत. त्या दोघांतील सुसंवाद आणि प्रेमच तर दिसून येतयं ना यांतून! पत्नी कडून उत्तर यायला उशीर झाला तर नाराजी ही व्यक्त करत. ही पत्रे… हा प्रेमाचा ठेवा… विसा भारती द्वारे प्रकाशित Letters by टैगोर (Volume 1) मध्ये संग्रहित करण्यात आली आहेत.

मृणालिनी देवींचं आणखी एक परिपक्व, प्रगल्भ असं रूप बघायला मिळालं ते रवींद्रनाथांनी शांतिनिकेतन मध्ये सुरू केलेल्या ब्रह्मचर्य आश्रम या शाळेच्या प्रारंभिक अवस्थेत! त्यावेळी पैशाच्या अडचणीमुळे रविंद्रनाथ खूप चिंतेत होते. त्यावेळी त्यांची ही सहधर्मचारिणी ख-या अर्थाने त्यांच्या पाठीशी उभी राहिली आणि तिने आपले लग्नातील सगळे दागिने विकून पैसा उभा केला. आणि, साकार झाली रवींद्रनाथांच्या कल्पनेतील ती शाळा! 

स्वतः मृणालिनी देवी कलकत्त्यातलं ऐश्वर्य सोडून आश्रमात रहायला आल्या. आणि विद्यार्थ्यांच्या रहाण्याची, जेवणाची, आरोग्याची काळजी घेऊ लागल्या. मुळातच सुगरण असलेल्या मृणालिनी देवी, स्वतः च्या हाताने सात्त्विक, पौष्टिक आणि चवदार स्वयंपाक बनवत आणि मायेनं जेवू घालंत. शाळेला कुटुंब रूप देऊन, त्या स्वतः आई झाल्या त्या सगळ्या मुलांची! टागोर घराण्याची स्वयंपाकाचे नवनवे प्रयोग करण्याची परंपरा येथे ही सांभाळली आणि आश्रमातील जेवणाची चव समृद्ध केली या अन्नपूर्णेनं!! 

आणि आपल्या पूर्वाश्रमीचं नाव भवतारिणी सार्थ करत… रविंद्रनाथांच्या शांतिनिकेतन चा भव… संसार तारिणी सिद्ध झाली.

मृणालिनी देवींचं मोठं दुर्दैव की त्या अल्पायुषी ठरल्या. फक्त २८ वर्षे आयुष्य लाभलं त्यांना. पण तरीही रविंद्रनाथांच्या शैक्षणिक आणि सांस्कृतिक स्वप्नांना प्रत्यक्षात आणण्यासाठी त्यांनी पडद्यामागून मोठीच भूमिका बजावली. इच्छा असूनही आपल्या पतीला खूप वर्षे साथ मात्र नाही देऊ शकल्या त्या.

अचानकच मृणालिनी देवींना एका अज्ञात आजाराने ग्रासलं. दिवसेंदिवस त्यांची प्रकृती खालवत गेली. रविंद्रनाथ त्यांना इलाजासाठी आपल्या जोरासांको ठाकुर बारी येथे घेऊन गेले. तेव्हा गाडी ६ तास लेट असल्याने त्यांना विलासपूर येथील स्टेशन च्या वेटिंग रूममध्ये थांबावे लागले. त्यावेळी त्या वेळेत ही त्यांनी फांकी नावाची एक कविता रचली. ती आजही बिलासपूर च्या प्लॅटफॉर्म वरील एका भिंतीवर शिलालेखाच्या रूपात आहे. रविंद्रनाथांनी शिलालेखात अक्षर रूपात… अ क्षर केले… आपल्या वेदनेला! 

शांतिनिकेतनला युनेस्को जागतिक वारसा… स्थळाचा दर्जा मिळवून देणा-या वटवृक्षाचे पहिले बीज ठरला… मृणालिनी देवींचा… आर्थिक आणि नैतिक पाठिंबा! तिथे त्यांच्यातील समिधा समर्पणात कुठेही कमी पडली नाही.

मृणालिनी देवींच्या निधनानंतर रविंद्रनाथांनी मृणालिनी आनंद नावाचा बगिचा तयार केला. तिथं अनेक प्रकारची फुलझाडे लावली. आपल्या ख-या अर्थाने सहचरी ठरलेल्या, प्रेरणा आणि समर्थनाचा अखंड स्त्रोत बनून राहिलेल्या पत्नीच्या निधनानंतर ही… तिची उपस्थिती… तिचं नाव टागोरांच्या कवितेत आणि संगीतात निरंतर गुंजत राहिलं. त्यांच्यातील नातं एक वारसा म्हणून टागोरांच्या काव्यरचनांमधील प्रेम, विरह, औदासीन्य यांत बघायला मिळतं…

तू जिथे गेली आहेस, तिथे माझे डोळे पोहोचू शकत नाहीत

पण तरीही, तू माझ्या मनात एक शांत प्रकाशासारखी जिवंत आहेस…

– रविंद्रनाथ टागोर

लेख क्र. १३

© प्रा.भारती जोगी

पुणे.

 फोन नंबर..९४२३९४१०२४.

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares