☆ # चहाच्या कपातले वादळ… # ☆ श्री नंदकुमार पंडित वडेर☆
अन चहाच्या कपात वादळ उठले… निमित्त तिचे माझे भांडणाचे झाले… शब्दाने शब्द वाढत गेला.. ना तिने खाली पडू दिला ना मी सोडून दिला… विषय तसा क्षुल्लक होता. नेहमी सारखा वादाला तोंड फोडणारा… तू तू त मैं मैं ने कागाळीला संथ सुरवात झाली… आणि हळूहळू ती तारसप्तका पर्यंत पोहचली… तुमचं हे नेहमीचंच असं असतं आपलं तेच खरं मानायचं… जरा म्हणून कुठे बायकोचं ऐकाल तर शपथ… आम्ही मेलं राब राब राबायचं नि वरती मनं मारायचं… तुम्हाला हवं ते करू द्यायचं आणि आम्ही ब्र सुद्धा काढायचा नाही… बायको म्हणून काही कदर राहिली नाही. मोलकरीण म्हणूनच किंमत दिली गेली… आता अडलयं माझं खेटर… तुम्ही आता खुशाल राहा तुमच्या घरी.. ही मी निघाले माझ्या माहेरी… मग लवकरच कळेल बायको म्हणजे काय चीज असते… तिच्या शिवाय घरी दारी दुसरं कोण झिजते… किती दिवस माझ्या विना इथं तोऱ्यात राहाल… दोन वेळेचे जेवणाचे नि तिनत्रिकाळ चहाचे मिळायचे झाले कि वांधे मग कोण पुसेल तुमचे हाल… फोनवर फोन निरोपावर निरोप धाडाल मला.. सुसरबाई तुझी पाठ बरं मऊ चल ना आता आपल्या घरला… समझोताचा आवाज नरम आला… जावा जावा माफ केले मी तुम्हांला चला आताच येते तुमच्या बरोबर आपल्या घरला… असा तर्हेने वादाचे काटे गळून गेलेल्या प्रीती च्या गुलाबाचा सुंगध पुन्हा दरवळला… अंदर कि बात सांगु का तुम्हाला..
खरं म्हणजे माहेरी जाण्याचा आततायी निर्णयाने माझाही जीव होता चुटपुटला… कसे राहतील घरी धनी माझ्यावाचुनी.. तनाने मी माहेरी नि सासरी मन तगमगुनी… वाट पाहत बसले कधी येतील मला न्यायला… कोणी काही म्हणोत भांड्याला भांड लागतचं कि संसारातल्या खऱ्या प्रेमाला तेव्हा तेव्हा अशी चहाच्या कपातली वादळं उठंत असतात… कुणीच हारत नसतात आणि जिंकत तर त्याहूनही नसतात…
☆ मला समजलेली संत तुकारामांची अभंग गाथा… भाग – २३ ☆ अरुणा मुल्हेरकर ☆
समाज स्थितीचे वर्णन
गाथेतील अभंग वाचत असता संत तुकारामांच्या काळी समाजस्थिती कशा प्रकारची होती याचाही आपल्याला काही अभंगांतून अंदाज येतो. आजच्या लेखात याच संदर्भातील काही अभंगांचा अभ्यास करावा असे मला वाटते.
समाजात फार अंदाधुंदी माजली होती. न्याय राहिला नव्हता. श्रेष्ठ मानला, जाणारा ब्राह्मण वर्ग त्यांचा नीती धर्म विसरला होता. अशा परिस्थितीचे वर्णन करणारा हा गाथेतील अभंग पहा—
हाती होन दावीती वेणा /
करिती लेकीची धारणा//
ऐसे धर्म जाले कली/
पुण्य रंक पाप बळी//
सोडिले आचार/
द्विजृाचहाड जाले चोर//
टिळे लपविती पातडी /
लेती विजार कातडी//
बैसोनिया तक्ता/
अन्योविण पीडिती लोका//
मुदबरव लिहिणे/
तेल तूप साबण केणे //
नीच्याचे चाकर/
चुकलिया खाती मार//
राजा प्रजा पिडी/
क्षेत्री दुश्चितासी तोडी//
वैश्य शुद्रादिक/
हे तो सहज नीच लोक//
* वघे बाह्यरंग/*
आत हिरवे वरी सोंग//
तुका म्हणे देवा/
काय निद्रा केली धावा//
समाजाची ही अशी अत्यंत हीनदीन अवस्था पाहून तुकाराम महाराज खेद व्यक्त करत आहेत आणि देवाला निद्रा सोडून धाव घेण्याचे साकडे घालत आहेत.
ते देवाला सांगतात, ” लग्नात लोक त्यांच्या कन्येचे पैसे(होन) घेतात आणि तिला सासरी पाठवतात. याचाच अर्थ चक्क तिचा विक्रय करतात. ज्याच्याकडून जास्त पैसे मिळतील त्याच्या गळ्यात ती सौभाग्यकांक्षिणी वरमाला घालणार. अत्यंत शोचनीय अशी बाब आहे ही. हा कलियुगात माजलेला अधर्म आहे. याने पुण्याचा क्षय होऊन पाप वाढत चालले आहे. ब्राह्मण आपला धर्म, सदाचार सोडून चहाड्याचोऱ्या करू लागले आहेत. कुंकवाचा टिळा लावणे, पंचांग बघणे सोडून देऊन यवनांप्रमाणे वेश धारण करणे त्यांनी सुरू केले आहे. न्यायाधीश न्यायाच्या आसनावर बसून न्याय असणाऱ्यांनाच शिक्षा ठोठवून पीडित करीत आहेत. पाकशाळेत (मुदबख) लागणाऱ्या बारीक सारीक वस्तूंचा जमाखर्च लिहिण्यात वेळ दवडत आहेत. ते नीच माणसांचे चाकर होऊन कामात झालेल्या क्षुल्लक चुकीसाठी मार खात आहेत. ज्या प्रजेचे पालन करायचे ती प्रजा आधीच दुःखी असताना क्षत्रिय राजे तिला लुटतात आणि पीडा देतात. वैश्य व शूद्रादिक लोक तर स्वभावतःच हलक्या मनोवृत्तीने वागत आहेत, त्यांच्याबद्दल काय सांगावे? अशा प्रकारे लोकांत बाह्य देखावा, अनाचार व ढोंगीपणा पसरला आहे. अंतरंगात मत्सर आणि वरून सोज्वळतेचे
सोंग या माणसांत भरले आहे. या दुष्टांना दंड देण्यासाठी अहो देवा तुम्ही या असा महाराज धावा करीत आहेत. ”
तुकाराम महाराजांना ब्राह्मणांकडून अशा प्रकारचा त्रास भोगावा लागला आहे. समाजातील त्यावेळच्या चातुर्वर्णी पद्धतीचा अर्थ विशेषतः या ब्राह्मण वर्गाने चुकीचा लावल्यामुळे, स्वतःला विद्वान समजून ते समाजातील दुबळ्या माणसांना अत्यंत हीन लेखत आणि त्यांचे जगणे असह्य करीत. यासाठीच अशा प्रकारचे अभंग रचून समाजात जागृती निर्माण करण्याचा तुकाराम महाराजांचा प्रयत्न असावा. या वर्ण व्यवस्थेसंबंधी असलेल्या हा अभंग पहा—
वेद विहित तुम्ही आई का हो कर्मे /
बोलतो ती वर्मे संतांपुढे//
चारी वर्ण जाले एकाचिये अंगी/
पाप-पुण्यभागी विभागीले//
प्रथम पाऊली पावविला पंथ/
आदी मध्य अंत भेद नाही//
आंबे बोरी वड बाभुळ चंदन/
गुणागुणभिन्न अग्नि एक//
तुका म्हणे मन उन्मन जो होय/
तोवरी हे सोय विधी पाळी//
तुकाराम महाराज म्हणतात, ” अहो लोकहो,
वेद प्रणित अवस्था काय आहे, ते तुम्ही ऐका. मी तुम्हा संतांपुढे ती सांगतो. एकाच देवापासून ब्राह्मणादी चार वर्ण निर्माण झाले आहेत. सर्व एकाच देवाची लेकरे आहेत. ते आपापल्या विहित कर्माने व पाप-पुण्याच्या भागाने वाटले गेले. सर्वांच्या उत्पत्तीचे स्थान जो हरी त्याच्या ठिकाणी प्रारंभ, मध्य, आणि अंत नाही. आंबे, बोरी, वड, चंदन यांचा दृष्टांत देऊन महाराज सांगतात या वृक्षातील गुणांचे व दोषांचे अनेक भेद आहेत. पण जळल्यानंतर ते एकच होतात. सर्वांची एक राखच होते. मूळ हरीच्या ठिकाणीही आदि अंत, कर्ता कर्म फळ इत्यादी भेद नसतो. जोपर्यंत मनाची उन्मनी अवस्था होत नाही तोपर्यंत मनुष्याने वेदाने सांगितलेल्या विधी मार्गा ने चालले पाहिजे. थोडक्यात, ब्राह्मण श्रेष्ठ आणि शूद्र नीच ही भावना मनातून त्यागिली पाहिजे.
त्या काळात सिंहस्थ- पर्वणी असा एक काळ मानला जात होता. आजही पंचांगात आपल्याला सिंहस्थ काळ हा शब्द सापडतो. या काळात लग्न, मुंज अशी मंगल कार्ये होत नाहीत असे म्हणतात. आता बदलत्या काळानुसार सर्व लोक ही परंपरा पाळतातच असे नाही. या समस्त काळात त्यावेळी ब्राह्मण डोक्यावरचे व दाढीचे केस काढायचे. त्यावरून महाराजांनी हा अभंग रचला आहे. ते म्हणतात—-
आली सिंहस्थ पर्वणी/
न्हाव्या भटा झाली धणी //
अंतरी पापाच्या कोडी/
वरी वरी बोडी डोई दाढी//
बोडीले ते निघाले/
काय पालटले सांग वहिले//
पाप गेल्याची काय खूण/
नाही पालटले अवगुण//
भक्तीभावेवीण /
तुका म्हणे अवघा सीण //
सिंहस्थ पर्वणी आली म्हणजे क्षेत्रात जे भट व न्हावी असतात त्यांची चंगळ होते. अंतःकरणात कोट्यावधी पापे आहेत, आणि दाढी काढली व डोक्याचे मुंडन केले तर त्याचा काय उपयोग? नुसते केस निघाले, पण अंगातील अवगुण निघाले का? त्याची काय खूण आहे? तुकारामांना एवढेच सांगायचे आहे की, पांडुरंगाची श्रद्धेने भक्ती करण्या वाचून बाकीचे सर्व व्यवहार पिडादायीच आहेत.
चातुर्वर्ण व्यवस्था हीच त्यावेळची मुख्य समाज व्यवस्था होती. या व्यवस्थेतील लोकांच्या कर्मा विषयी आणि प्रारब्धाविषयी महाराज वेळोवेळी सांगतात.
पहा हो देवा कैसे जन/
भिन्नभिन्न संचिते //
एक नाही एका ऐसे/
दावी कैसे शुद्ध हीन//
पंचभूते एकी राशी/
सूत्रे कैसी ओळखावी//
तुका म्हणे जो जे जाती/
त्याची स्थिती तैशी ते//
देवा, हे लोक किती निरनिराळ्या प्रारब्धाचे आहेत. एका सारखा एक नाही. प्रारब्धाच्या योगाने काही चांगले आणि काही हीन अशी विविधता दिसते. सर्व सृष्टी पंचमहाभूतांच्या एकाच मूळ पदार्थाने बनली आहे, असे असताना नशिबाची भिन्नता कशी ओळखावी? जो जन्माप्रमाणे, कर्माप्रमाणे ज्या जातीचा असेल तशीच त्याची स्थिती असते. थोडक्यात ब्राह्मणांनी विद्याभ्यास करावा, वेदपठण करावे, क्षत्रियांनी देशाचे सीमा रक्षण करावे, वैश्यांनी व्यापार करावा आणि शूद्रांनी गावाची साफसफाई करावी. समाजाची घडी उत्तम रीतीने बसण्यासाठी ही व्यवस्था होती, परंतु ब्राह्मण वर्गांनी त्याचे स्वरूप उच्च~नीच अशा प्रकारचे केले.
सध्या सगळीकडे तीन वर्षांनी येणाऱ्या पारंपारिक अधिक मासाची, म्हणजेच धोंड्याच्या महिन्याची जोरदार रेलचेल सुरू आहे. मुली-जावयांना हक्काने घरी बोलवणं, चांदीच्या ताटात पुरणपोळीचं सुग्रास जेवण देणं, आणि ते ३३ अनरसे देऊन जावयाला ‘लक्ष्मी-नारायण’ मानून त्याचे लाड पुरवणं सुरू आहे.
परवा दुपारी मी सुद्धा माझ्या घराच्या सोफ्यावर बसून जावयाला काय काय खरेदी करायची, याची मोठी यादी करत होते. माझा नवरा नेहमीप्रमाणे कोपऱ्यात बसून अगदी शांतपणे वर्तमानपत्र वाचत होते. बदल हवा असं त्यांना कधी वाटत नाही. बदल केला तर नक्कीच तो चांगला असं असं वाटतं.
जावयाच्या खरेदीची यादी बनवता बनवता अचानक माझ्या डोक्यात एक विचार चमकला. मी हातातली लेखणी बाजूला ठेवली आणि नवऱ्यालाम्हटलं, “अहो ऐकलंत का? जावई दुसऱ्याच्या घरातून आपल्याकडे दोन दिवस पाहुणा म्हणून येतो, तर आपण त्याला देव मानून त्याचे एवढे लाड करतो. पण जी मुलगी तिचं हसतं-खेळतं माहेर सोडून, स्वतःचं आडनाव बदलून, आपलं घर साभाळायला ‘सून’ म्हणून येते… तिच्यासाठी कॅलेंडरमध्ये असा एकही महिना का नसावा? म्हणून मी ठरवलंय, या अधिक मासाला छेद देत मी माझ्या सुनेसाठी कॅलेंडरमध्ये एक नवीनच सण सुरू करणार आहे— ज्याचं नाव असेल ‘वजा मास’!”
माझं हे बोलणं ऐकून नवऱ्यानी वर्तमानपत्र खाली ठेवलं, चष्मा नाकावर सरकवला आणि आश्चर्याने म्हणाले, “हा कुठला नवीन मास? कॅलेंडरमध्ये जेमतेम १२ महिने असतात, १३ वा अधिक मास असतो. हा ‘वजा मास’ कुठून टपकला?”
मी त्यांना हसून समजावून सांगितलं की, ‘वजा’ म्हणजे वजाबाकी नाही, तर सुनेच्या डोक्यावरचा घरचा, स्वयंपाकघराचा आणि जबाबदाऱ्यांचा सगळा ताण महिनाभरासाठी ‘वजा’ करणे! हा संपूर्ण महिना तिने फक्त तिचं आयुष्य बिंधास्त आणि आनंदाने जगायचं.
तेवढ्यात माझा मुलगा आणि सून दिवसभराचं काम आटपून घरात आले. सुनेच्या एका हातात कष्टाची पिशवी होती आणि दुसऱ्या हातात बाजाराची भाजी. तिची ती दमलेली अवस्था बघून मी लगेच तिच्या हातातली भाजीची पिशवी बाजूला घेतली आणि तिला प्रेमाने पाटावर बसवलं. मी घरात जाहीर केलं की, आजपासून या घरात माझ्या सुनेसाठी ‘वजा मास’ लागू झाला आहे!
सुनेने आश्चर्याने विचारलं, “वजा मास? आई, म्हणजे नक्की काय?”
मी तिला सांगितलं की, या संपूर्ण महिन्यात तुला स्वयंपाकघरात पाऊल ठेवायला सक्त मनाई असेल. जावयाला ५६ भोग चालतात ना? मग माझ्या सुनेला महिनाभर तिच्या आवडीचे पुरणपोळी, श्रीखंड-पूरी आणि सुग्रास जेवण तिची सासू स्वतःच्या हाताने बनवून भरवणार! सकाळी उठल्यापासून ते रात्रीपर्यंत तिने फक्त सुखात बसायचं. “रात्री जेवणात काय बनवू?” हा प्रश्न तिच्या आयुष्यातून महिनाभरासाठी वजा केला जाईल.
मुलाने मध्येच विचारलं, “बरं, आणि हिची हौसमौज?” त्यावर मी मुलाला फर्मान सोडलं की, या महिन्यात सुनेला तिच्या मैत्रिणींसोबत फिरायला, बाजारात जाऊन हवी ती खरेदी करायला घरची तिजोरी खुली असेल! तिच्या आनंदावर आणि खर्चावर घरातून एकही प्रश्न विचारला जाणार नाही. साडी नेसण्याची किंवा घरकामाची अजिबात सक्ती नाही, अगदी सुती आणि सुटसुटीत कपड्यांमध्ये तिने फिरावं. रात्री हवं तितकं जागावं आणि सकाळी मनासारखं उशिरा उठावं, हिला घरात कोणीही उठवणार नाही!
माझा हा मराठमोळा आणि कल्पक विचार ऐकून सुनेच्या डोळ्यात आनंदाश्रू आले. ती गदगद होऊन म्हणाली, “आई… खरंच? आजपर्यंत सासरी आल्यावर फक्त जबाबदाऱ्या वाढतात हेच ऐकलं होतं. पण सासू आपल्यासाठी असा विचार करू शकते, यावर माझा विश्वासच बसत नाहीये!”
मी तिचे डोळे पुसले आणि म्हटलं, “विश्वास ठेव बाळा! जावयाला आपण विष्णू रूप मानतो, पण सून तर साक्षात चालती-बोलती गृहलक्ष्मी असते. या वजा मासाच्या शेवटच्या दिवशी मी तुझी चांदीच्या ताटात ओवाळणी करणार आणि जावयाच्या ३३ अनरशांच्या ऐवजी, तुला तुझ्या आवडीच्या ३३ सुंदर वस्तू सासरकडून वाण म्हणून मिळणार!”
हे सगळं ऐकून माझे कारभारीही हळवे झाले. त्यांनी वर्तमानपत्र बाजूला ठेवलं आणि मुलाला म्हणाले, “बाळा, काढ घरची तिजोरी आणि दे हिच्या हातात… आजपासून घरात वजा मास लागू! आजपर्यंत आम्ही पुरुषांनी फक्त जुन्या परंपरा पाळल्या, पण नात्याला इतकं मायेचं आणि सुंदर रूप देता येतं, हे तुझ्या आईकडून शिकायला मिळालं. ” मुलानेही हसत हसत आईच्या या निर्णयाला होकार दिला.
सुनेने जेव्हा मला प्रेमाने मिठी मारली, तेव्हा मला जाणवलं की, परंपरा फक्त जुन्या चौकटीत जगण्यात नसते, तर नव्या पिढीला पोटच्या मुलीसारखं समजून घेऊन नात्यांना नवा श्वास देण्यात असते. जर प्रत्येक सासूने सुनेला अशी मायेची सुट्टी दिली आणि स्त्रीने स्त्रीचा असा आदर केला, तर महाराष्ट्रातलं प्रत्येक घर स्वर्गासारखं सुंदर होईल.
मी तर माझ्या कॅलेंडरमध्ये ‘वजा मास’ लिहून ठेवलाय, आणि माझी सून सासरी यायला आता रडत नाही, तर हसत हसत येणार आहे!
जावई हा केवळ पाहुणा असतो, पण सून ही नव्या पिढीला आणि वंशाला जन्म देणारी, संपूर्ण घराला उजळवून टाकणारी साक्षात महालक्ष्मी असते!”
त्यामुळे यंदाच्या उन्हाळ्यात अधिक मासाचे अनरसे जावयाला भरवताना, आपल्या घरच्या लक्ष्मीच्या सुट्टीचा ‘वजा मास’ ठरवायला विसरू नका. सासूबाईंनो, कंबर कसा आणि कामाला लागा; कारण सुनेचा चेहरा खुलला की संपूर्ण घर कसं कडाडून हसतं!
बाकी, आमचा हा ‘वजा मास’ तुम्हाला कसा वाटला? तुमच्या घरातल्या सुनेला हा सुखद धक्का कधी देताय?
लेखिका : सौ तृप्ती देव
भिलाई छत्तीसगड
प्रस्तुती : उज्ज्वला केळकर
संपर्क – निलगिरी, सी-५ , बिल्डिंग नं २९, ०-३ सेक्टर – ५, सी. बी. डी. – नवी मुंबई , पिन – ४००६१४ महाराष्ट्र
मो. 836 925 2454, email-id – kelkar1234@gmail.com
≈ संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
“दूसरों को नहीं खुद को समझाना सबसे बड़ी चुनौती होती है।”
आयुष्य म्हणजे roller coaster ride, चढ उतार, चार धागे सुखाचे तर दहा धागे दुःखाचे. कधी स्वतः च्या चूकीमुळे तर कधी दूसऱ्यांच्या, कधी निर्णय चूकतात म्हणून, तर कधी (+, -, ×, ÷) ही चिन्हे योग्य वेळी, योग्य जागी वापरली जात नाहीत म्हणून. कधी ते सर्व आपल्या नशिबातच होत, असं समजून, वेगवेगळ्या प्रसंगांना सामोरे जावे लागते. आयुष्य कधीच एक रंगी नसत. यात बघायला गेलं तर दोष असा कोणाचाच नसतो. वयाप्रमाणे अनुभव मिळतो, समज वाढते. हळूहळू आपण शहाणे होत जातो. प्रश्नांना हाताळायची कला आत्मसात करतो.
घर, बाहेर, ऑफिस अशा अनेक जागी काही ना काही चालूच असते. कधी कधी तर सर्व दिशांनी अटॅक होतो. म्हणजे अगदी वॉशिंग मशीन मध्ये जसे कपडे धुतले जातात ना, तसेच गोल गोल फिरत राहतो. एक प्रश्न सोडवा, जरा श्वास घ्या, तर दुसरा हजर. कदाचित त्यांनंतर आपण जास्त चकचकीत, हुशार होऊन आयुष्यात येणाऱ्या पूढच्या प्रश्नांना जास्त आत्मविश्वासाने उत्तर देण्यास समर्थ होत जातो. विचारांची क्लॅरिटी वाढते.
प्रश्न आयुष्याच्या प्रत्येक फेज मध्ये असतातच.
मला काही ही problem नाही. असं म्हणणारे या जगात कोणीच नाही. प्रोब्लेम ची डिग्री कमी जास्त असू शकते.
अडचणी आल्या की माणसाला सर्व दोष दिसतात गृहदोष, वास्तूदोष, पितृदोष सर्व दोष दिसतात. देव आठवतात.
आयुष्यात दुःख आहेत, म्हणून तर देव आहे. देऊळ आहे. नाही तर देवाला सुद्धा कोणी विचारलं नसतं बहुतेक. शनिवारी शनी देवता, मंगळवारी बजरंग बली ला कोणी विचारलं असतं का?? फक्त देवावर माझी श्रद्धा आहे, या विचाराने जाणारे किती लोक असतात??
देव सुद्धा म्हणत असेल,
अरे!! कधी फक्त भेटायला ही येत जा, नेहमी काही तरी मागायलाच येतो. बरे असो
तरीही आयुष्य छान, सुंदर, आनंदी असूच शकत. नाही का?? कारण,
“Happiness is not the absence of problems but it’s our ability to deal with them. ”
देवही आपल्याला त्याच समस्या देतो, ज्या सोडविण्याची क्षमता आपल्यात आहे. त्यात आपण उत्तीर्ण होणार, याची देवाला खात्री असते.
समजा एखादा प्रोब्लेम आलाच आणि जास्त दिवस घरात जम ठोकून बसलाच, तर थोडा काळ शांत बसावं. थोडा विसावा घ्यावा. प्रत्येक दुःखाचे ही एक ठराविक वय असतच. या BAD PATCH ला जाऊ द्यावे. आणि मग नव्याने सुरुवात केली तर काय हरकत आहे?? काही गोष्टी तिथल्या तिथे सोडून दिल्या तर त्रासही कमी होतो.
माझी आजी नेहमी म्हणायची,
सुख मिरवायचे नाही, दुःख गिरवायचे नाही.
प्रोब्लेम नेहमी मोठेच असतात, असं नाही. खूपदा तर प्रोब्लेम्स, self created असतात. म्हणजे,
चढाओढ, one up ship कार्यक्रम, सर्व गोष्टी माझ्या मनासारख्याच झाल्या पाहिजे हा आग्रह, लवकर श्रीमंत व्हायची इच्छा, उसकी साड़ी मेरे साड़ीसे सफ़ेद कैसे?? हा असा स्वभाव, काल्पनिक भीती, हे सर्व स्वतः च निर्माण केलेले अनावश्यक प्रोब्लेम असतात. दुसऱ्यांचे सुख बघून त्रस्त होणारेही असतातच.
आयुष्य म्हणजे सापसीढी चां खेळ. नवऱ्या बरोबर कागदी पत्रिकेत न जुळलेल्या गुणांबरोबर जुळवून घेण्याची कसरत, आयुष्य म्हणजे नियतीने जे पत्ते तुमच्या हातात दिले आहेत, त्यांचा चांगला डाव मांडणे, आयुष्य म्हणजे एक प्रवास हसत पूर्ण करायचा की रडतखडत करायचा ही प्रत्येकाची इच्छा.
आयुष्याच्या महाभारतात स्वतःलाच कधी कृष्ण, कधी अर्जुन बनून, रोज स्वतः च आपल्या रथाचा सारथी बनून लढाई जिंकायची असते. कधी कधी दोन पाऊल मागे घेण्यातही जीत दडलेली असते.
म्हणतात ना.
जीतने वाला ही नहीं, बल्कि कहां पे क्या हारना हैं । ये जानने वाला भी सिकंदर होता हैं।
कठीण काळात. दुसऱ्याला समजविण्यापेक्षा स्वतः ला समजाविणे हे सगळ्यात मोठ चॅलेंज आपल्या समोर असत.
म्हणतात ना,
जिंदगी में आप तब तक नहीं हार सकते, जब तक आप स्वयंसे ना हारो।
नियतीने आपली Excel Sheet तयार ठेवली आहे. आपल्या आयुष्यात कोण, कधी? केंव्हा? भेटणार?? काय घडणार?? हे script तयार आहे. तेंव्हा या सिनेमात आपल्याला काम करायचे आहे. आपला रोल ठरलेला आहे. त्यात आपल्याला काही खोडाखाड करता येणार नाही.
जे आहे ते आहे. तेच मान्य करायचे. देवाच्या/ नियतीच्या script वर पूर्ण विश्वास ठेवायचा.
जे होईल ते चांगलंच होईल.
देव आहे ना काळजी घ्यायला, सर्व काळजी आपणच केली तर मग देव काय करणार??
तेंव्हा,
मजेत रहा,
खाओ पिओ ऐश करो.
ये जिंदगी ना मिलेगी दोबारा ।
म्हणतात ना,
“जिस मनुष्य को परमात्मा के न्याय पर विश्वास है,
उसे संसार की कोई भी परिस्थिति विचलित नहीं कर सकती ।
☆ “Load-bearing R. C. C. पेक्षा मजबूत निघाले!”☆ श्री संभाजी बबन गायके
– – प्रा. मुकुंद पाध्ये
एका सेवानिवृत्त प्राध्यापकाचे सैनिकी कल्याणासाठी कोटीचे उड्डाण!
गणित, शास्त्र विषयाच्या शिक्षकांचा सहभाग असलेल्या पेपरफुटीच्या बातम्यांनी देशात रणकंदन माजवलेले असताना एका गणिताच्या अध्यापकांनी कोणताही गाजावाजा न करता देशापुढे एक आदर्श उभा करून कमाल केल्याची बातमी समजली ती कारगिल वीर, PARA स्पेशल फोर्सेसचे सुभेदार मेजर बाळासाहेब मोहारे (सेवानिवृत्त) यांच्या एका मेसेजमधून. विदर्भातील वकील अजिंक्य धर्माधिकारी साहेबांनी ही बातमी लिहिली आहे. वकील साहेबांनी ही माहिती प्रसाद महाजन यांच्याकडून समजली!
अकोला येथे गणिताचे अध्यापन करून अवघं आयुष्य विद्यार्थी सेवेत व्यतीत केलेल्या मुकुंद पाध्ये सरांनी वयाच्या पासष्टाव्या वर्षीपर्यंत पै-पैसा जमा करून एक कोटी रुपये भारतीय सैनिकांच्या कल्याणनिधीसाठी दान दिले… ही ती बातमी!
समाजाचा load ख-या अर्थाने bear करणारी ही माणसं. इतर जण R. C. C. वापरून स्वत:ची घरं मजबूत करण्याचा integrated प्रयत्न करीत असताना दातृत्वाची ही उत्तुंग इमारत मजबुतीने उभी करणारी पाध्ये सरांसारखी माणसं पाहिली की वाटतं… अजूनही फार काही बिघडलेले नाही!
आजच्या जागतिक भयावह परिस्थितीत जगातील इतर सर्वच देश त्यांचे त्यांचे लष्कर अधिकाधिक सामर्थ्यशाली बनवण्याच्या प्रयत्नांत दिसते. यासाठी आर्थिक पाठबळ तर लागतेच. आपल्याकडे संरक्षणावर कमी तरतूद आहे, असेही नाही. मात्र जनतेने लष्कराच्या आर्थिक सबलीकरणात सहभागी होण्याने राष्ट्रीय एकात्मता, परस्पर सहयोग वाढीस लागून त्यातून आदर्शवत व्यवस्था उभी राहू शकते, हे ध्यानात घ्यावे लागेल. विशेषत: सैनिक कल्याण निधीमध्ये नागरीकांनी सढळ हातांनी साहाय्य करणे गरजेचे आहे. सैनिकांचे उपकार फेडण्याचा हा एक उत्तम मार्ग आहे. पुण्यातील कै. योगेश चिथडे साहेबांनी त्यांच्या पत्नी सुमेधाताई चिथडे यांच्या साथीने आणि लोक सहभागातून सियाचीन दुर्गम बर्फाळ प्रदेशातील रुग्णालयांमध्ये भारतीय सैन्यासाठी कित्येक कोटी रुपयांची ऑक्सिजन निर्मिती यंत्रणा भेट दिल्याचे देशाला ठाऊक आहे. ही यंत्रणा नागरीकांनाही उपयुक्त ठरते आहे!
प्राध्यापक मुकुंद पाध्ये सरांनी या त्यांच्या donation मधून अनेकांची शिकवणीच घेतली आहे, एक धडा घालून दिला आहे, असं म्हणावंसं वाटतं! यातून सरांचा class ही दिसून आला! अशी माणसं वाढली तर देश NEET चालू शकेल…!
(पूर्वसूत्र- “बाबा तुम्ही सहन करू शकणार नाही अशी एक गोष्ट आहे. आता रात्र बरीच झालीय.. पण हे तुम्हाला आत्ताच सांगणं गरजेचं आहे. तुम्ही त्रास करून घेणार नसाल तरच सांगतो. ” सलिल म्हणाला.
“नाही त्रास करून घेणार. तू सांग.. काय झालंय?”
त्याने जे कांही सांगितलं ते ऐकून मी सून्न झालो. अक्षरशः गोठून गेल्यासारखा क्षणभर बसून राहिलो. तो म्हणाला होता तसं पैशाने ज्याची भरपाई होऊच शकणार नाही असं बरंच कांही मी गमावून बसलो होतो!!)
महापुरामुळे घरी झालेल्या संपूर्ण विध्वंसाचं शक्य तितक्या मोजक्या शब्दात वर्णन करून तो म्हणाला होता,.. “बाबा आपल्या बंगल्यात ८. ५० फूट उंचीपर्यंत पाणी आलेलं होतं. घरात आता फक्त ओल मुरलेल्या भिंती आणि दिवसभर राबून घरातला सगळा चिखल उचलून बाहेर बागेत रचल्या नंतरचे चिखलमाखलेले फ्लोअर अशी अवस्था आहे. ते सगळं पुन्हा मिळवता येईल बाबा पण तुमचं लेखन… ” तो बोलायचा थांबला. त्याने न सांगताही मला अंदाज आला होता… “लाॅफ्टवर ठेवलेल्या माझ्या बॅगा ना.. ?”मी शांतपणे विचारलं.
“हो. त्या तुमच्या सर्व बॅगांमधे तुम्ही जपून ठेवलेलं पूर्वीपासूनचं तुमचं सगळं लेखन भिजून, कुजून लगदा झाल्याने टाकून द्यावं लागलंय बाबा… “
ऐकून मी सून्न झालो. त्या सर्व बॅगांपैकी कुठल्या बॅगेत काय आहे हे मला फक्त माहित होतं असं नाही तर ते तोंडपाठ होतं. माझ्या आजवरच्या सर्व कथांची मासिके, माझी नाटके, एकांकिका, बालनाट्ये यांची हस्तलिखिते, सेन्साॅर सर्टिफिकेटस्, मला मिळालेले सगळे लेखन-पुरस्कार, ‘प्राजक्त’ या मासिक पत्रिकेत दरवर्षी वेगवेगळे विषय घेऊन गेली अकरा वर्षे मी लिहित असलेल्या सदरलेखनाच्या छापील प्रतींचे गठ्ठे ज्यात ‘प्राजक्त’चे तोवरच्या माझ्या लेखांच्या एकूण १३२ छापील प्रतींचे अंक होते… आणि असंच बरंच कांही! सगळं एका रात्रीत स्वाहा झालं होतं!त्या सदरलेखांमधील जवळजवळ सर्वच आशयांवरून एकेक कथा, एकांकिका, किंवा एखादं दोन अंकी नाटकही.. अशा अनेक नव्या साहित्यकृतींना आकार देण्याचा माझा मनोदय होता. त्याचं नियोजन सुरू होतं आणि अचानक माझं सगळं अक्षरधनच पाण्याच्या प्रचंड प्रवाहाने लुटून नेलं होतं!!
माझ्या खरंच ते जिव्हारीच लागलं. त्या रात्री अंथरुणाला पाठ टेकली. आणि त्या अस्वस्थ मनःस्थितीत या विध्वंसात देवघरातील ती दत्ताची मूर्ती? ती.. तीही.. अशीच.. ? या विचाराचाच फटका बसावा तसा मी ताडकन् उठून बसलो. बाकी सर्वजण झोपले होते. सलिल/अनघा दोघांचं उद्याच्या घरस्वच्छतेच्या कामांच्या नियोजनाबद्दलचं बोलणं अस्पष्टसं कानावर आलं न् मी त्या दिशेला धाव घेतली. , !ती.. ती.. दत्तमूर्ती न् इतर सगळे देवही चिखलात वहात जाऊन रुतले गेले असतील तर? तेही चुकून त्या कचऱ्याच्या ढीगात टाकले गेले नसतील ना? नुसत्या कल्पनेनेच मी धास्तावलो.
“बाबा.. तुम्ही झोपला नाहीत अजून? असे घाबरलायत कां? काय झालंय?” मला पहाताच सलिलने विचारलं.
” मला सांग.. आपल्या देवघरातल्या देवांचं काय? ते पण वाहून गेलेत कां? ते.. ते.. चिखलाबरोबर त्या कचऱ्याच्या ढीगात तर टाकले गेले नसतील ना रे?” मी काकुळतीने विचारलं.
सलिलने अनघाकडे पाहिलं
“नाही बाबा… अहो, दिवसभराच्या गडबडीत तुम्हाला सांगायचं राहूनच गेलं. बाबा.. एक आश्चर्य वाटेल अशी आनंदाची बातमी आहे. “
इतक्या सगळ्या विध्वंसातही आनंदाची बातमी?… मला कांही समजेचना.
“बाबा, घरातला निम्मा शिम्मा चिखल बाहेर बागेत टाकून झालाय. राहिलेला उद्या दिवसभरात टाकून होईल. पण आश्चर्य म्हणजे आपण देव मांडतो ते ते छोटं देवघर तिथंच तिरकं होऊन चिखलात रुतून राहिल्याने त्यातले देव आणि ती दत्तमूर्तीही त्यावरच विखुरलेले दिसले. मी ते देवघर आणि ती मूर्ती स्वच्छ धुवून तिथे घरच्या किचन कट्ट्यावर ठेवलीय बाबा… ” हे ऐकताच माझ्या अंगावर शहाराच आला एकदम.. ! माझं सगळं अक्षरधन वाहून गेलं तरी ‘तो’ आहे! मग आणखी काय हवं? मनाला झालेल्या त्या अनपेक्षित आनंदाने मी भारावून गेलो होतो. सगळं ‘त्या’च्यावर सोपवून होईल ते पहात रहायचं असं मनोमन ठरवलं आणि निश्चिंत झालो.. !!
अंथरुणाला पाठ टेकली तेव्हा मध्यरात्र उलटून गेली होती. त्या निश्चिंत मनात आपल्याला या प्राप्त परिस्थितीत काय करता येईल याचे विचार सुरु झाले आणि झोप निघूनच गेली. मी झरकन् उठून शेजारच्या टीपाॅयवर ठेवलेला माझा मोबाईल उचलला. आजवर माझी नाटके आणि एकांकिका स्पर्धेत सादर केलेल्या मुंबई, पुणे, अहमदनगर, डोंबिवली, नाशिक, अमरावती, नागपूर, इंदौर अशा विविध ठिकाणच्या सर्व संस्थांची व्हाॅटस् अॅप काॅन्टॅक्स उपलब्ध होती. मी लगेचच सर्वांना सविस्तर मॅसेज पाठवून पुरामुळे निर्माण झालेल्या गंभीर परिस्थितीची कल्पना दिली आणि त्यांनी सादर केलेल्या माझ्या नाटक/एकांकिका यांच्या संहिता त्यांच्याकडे उपलब्ध असतील तर त्याची एक प्रत प्लीज मला पाठवावी अशी विनंती केली. मी यापेक्षा जास्त कांहीच करू शकत नव्हतो.
माझ्या या नाट्यसंहितांपेक्षाही माझ्यासाठी कणभर जास्तच महत्वाचं होते ते ‘प्राजक्त’ मधल्या जाने. २०१० ते जुलै २०१९ या जवळजवळ साडेनऊ वर्षातल्या माझ्या सदर लेखनाचे १३२ अंक पुन्हा मिळवणे. पण तो प्रश्न अजून अधांतरीच होता.
दुसऱ्या दिवशी सकाळी मी ‘प्राजक्त’ च्या ऑफिसमधे फोन करून विचारणा केली. पुरापूर्वी कांही दिवस आधीच साफसफाई करताना कपाटांमधे जागा करण्यासाठी तिथे साठलेले सगळे जुने अंक त्यांनी रद्दीत विकून टाकले होते!
अखेर एक शेवटचा उपाय म्हणून त्या महिन्याच्या सदरासाठी लिहिलेल्या लेखाबरोबर मी एक जाहीर निवेदन पुढच्या अंकात प्रसिद्ध करण्यासाठी लिहून दिलं. त्यात माझी नेमकी अडचण विशद करून प्राजक्तचे सुरूवातीपासूनचे अंक कुणाकडे उपलब्ध असतील तर मला कळवावे असं वाचकांना आवाहन केलं आणि मी त्याच्या झेरॉक्स कॉपीज् स्वखर्चाने काढून घेईन हेही लिहिलं. या सगळ्या सदरलेखनाला आजपर्यंत कितीतरी वाचकांनी कौतुक करणाऱ्या प्रतिक्रिया वेळोवेळी आवर्जून पाठवल्या होत्या. त्यांच्यापैकी अगदी एकाने जरी ते अंक जपून ठेवले असतील तर त्या अंकांची मला गरज आहे हे निवेदन दिल्याशिवाय त्याच्यापर्यंत पोचणार कसं? हाच विचार ते निवेदन दिलं तेव्हा माझ्या मनात आलं. आणि ध्यानीमनी नसताना खरंच चमत्कार घडला! जादूची कांडी फिरावी तशी सगळी सूत्रं वेगाने हलत गेली आणि… !
दुसऱ्याच दिवशी सर्व नाट्यसंस्थांकडून मी पाठवलेल्या मेसेजेस् ना सकारात्मक उत्तरे आली आणि पुढे दोन-तीन दिवसात त्यापैकी काहींनी पीडीएफ् रुपात तर बाकीच्यांनी त्या संहितेची झेराॅक्स काॅपी मला पाठवून माझ्या हरवलेल्या अक्षरधनाची कांही प्रमाणात कां होईना भरपाई केली. हा एक सुखद धक्काच होता माझ्यासाठी! नंतर मधे आठदहा दिवसही उलटले नसतील आणि अचानक एक फोन आला.
“आपण अरविंद लिमये बोलताय ना?” आवाज अपरिचित. कांहीसा थकलेला. माधवनगरचे कुणी सुधाकर फाटक आजोबा बोलत होते.
“मी प्राजक्तमधलं तुमचं निवेदन वाचलं. त्यातले तुमचे लेख मला आवडतात. त्यामुळेच मी सभासद झाल्यापासूनचे म्हणजे साधारण २०१५पासूनचे सगळे अंक क्रमवार अॅरेंज करून ते जपून ठेवलेत. पण अट एकच. तुम्ही स्वतः येऊन ते घेऊन जायचे. त्यामुळे निदान आपली भेट तरी होईल. आणि हो.. त्याच्या झेराॅक्स काढायची तसदी नका घेऊ. आज माझे वय आहे ८५. मी प्राणपणाने जपलेले ते अंक योग्य माणसाच्या हाती गेल्याचं समाधान मला मिळतंय याचा मला आनंदच आहे… !” ते बोलत होते. मी थक्क होऊन ऐकत होतो. हे एवढंच नव्हतं. दुसऱ्याच दिवशी ‘प्राजक्त’चं मुद्रण कोल्हापूरला ज्या प्रेसमधे होत असे त्या प्रेसचे श्री. डबीर यांचाही निरोप आला. त्यांच्याकडून २०१० च्या आधीचेही सगळे अंक सेव्ह असल्याने त्यांनी ते पेनड्राईवमधे डाऊनलोड करून देण्याचे आश्वासन दिले.. !
जे मला कधीच परत मिळू शकणार नाही असं मला वाटलं होतं ते माझं सगळं अक्षरशः मला अचानक परत मिळणं हा चमत्कारच होता माझ्यासाठी !!
हे सगळं इतकं अनपेक्षित, इतकं सहज, आणि इतकं अल्पावधीत घडलं की हे एखादं सुखद स्वप्नच आहे असंच वाटत राहिलं! प्रतिकूल परिस्थितीत हे असं हवं ते हवं तसं मला बहाल करण्याची ‘त्या’ची किमया म्हणजे अंधारून आलेल्या मनात भरून राहिलेला मिट्ट काळोख क्षणार्धात उजळून टाकणाऱ्या लख्ख प्रकाशासारखी ‘त्या’च्या अलौकिक स्पर्शाची अनुभूती वाटली मला!
नुकतेच घडून गेल्यासारखे मला इतक्या वर्षांनंतरही स्वच्छ आठवणाऱ्या स्वेच्छानिवृत्ती नंतरच्या काळातले हे दोन प्रातिनिधिक प्रसंग.. ! खरंतर तो आणि मी या विषयाशी संबंधित मनात घर करून राहिलेल्या अशा असंख्य आठवणींचा या प्रदीर्घ अशा सदरलेखनाच्या निमित्ताने मी घेतलेला वेध म्हणजे एकापरीने ‘त्या’चा स्पर्श जाणवलेल्या आजवरच्या आठवणीत साठलेल्या अनेक अनुभवांकडे माझे मागे वळून पहाणेच होते! यातून माझ्या नकळत्या वयापासून मी मनात जपलेला ‘तो’ आज वानप्रस्थात प्रवेश केलेल्या माझ्या आयुष्याच्या उतरत्या वळणावर उभ्या मला कसा दिसतो ते आता या सदराच्या पुढच्या समारोपाच्या भागात.. !
☆ कुलकर्णी सरांचे अपेक्षित प्रश्न ☆ श्री अमोल केळकर ☆
साधारण 90 च्या दशकात आम्ही खाजगी क्लास ला जात होतो. (म्हणजे आमची इच्छा नव्हती पण आमच्या आई-वडिलांना वाटायचं, पोरगा शिकून मोठा व्हावा). आमच्या शाळेतील सरांकडेच आम्ही शनिवार रविवार क्लासला जात असू
ही शिकवणी म्हणजे आमच्यासाठी अभ्यास यथातथाच पण टवाळखोरी जास्त असा विषय होता. (मित्रांना भेटणे आणि मैत्रिणींना बघणे)
रविवारी सकाळी तर सकाळच्या दूरदर्शन वर लागणाऱ्या मालिका ( कच्छी धूप वगैरे वगैरे) सहित क्लासचा कॉम्बो पॅकेज असायचा.
परीक्षेच्या आधी काही दिवस मात्र वातावरण गंभीर व्हायचं. ( इतरांसाठी)
प्रत्येक विषयाच्या पाठ्यपुस्तकातील अपेक्षित कुठले प्रश्न येतील यावर कुलकर्णी सर टिकमार्क करून द्यायचे (भले एखादा त्यांचा विषय नसला तरी)
सगळेजण जाम खुश व्हायचे, आता हेच प्रश्न परीक्षेत येणार असं वाटायला लागायचं ( 10 पैकी 8 प्रश्नांवर टिक असायची).
परीक्षा झाल्यावर हातातली प्रश्नपत्रिका त्या क्षणी कचऱ्याच्या टोपलीत जायची, त्यामुळे सरांनी टिक करून दिलेले किती प्रश्न
पेपरात आले हे मात्र (मला) कधीच समजलं नाही.
70-80 % मार्क मिळवत गेलो आणि हे आम्हाला ‘यश ‘ वाटायचं.
आमची पिढी समाधानी होती.
आमचं गाव ‘ मोटे ‘ नसलं तरी लहान ही नव्हतं
शिक्षकांचे काही लाडके विद्यार्थी असले तरी कुणी ‘ चाटे’ गिरी करायचे नाहीत, शिक्षक करूही द्यायचे नाहीत
(आपल्या क्लासला विदयार्थी येत नाही म्हणून कुणी बदला घेत नसत)
(ढगफुटी आणि) पेपरफुटी न होण्याच्या काळात आमचे शिक्षण झाले हे आमच्या पिढीचे नशीब
टीप : 12 वीला बोर्डाच्या परीक्षेत, पेपराच्या आधी 10 मिनिटे आमचा एक मित्र 1-2 प्रश्न सांगायचा आणि ते प्रश्न हमखास यायचेच. तो सध्या ऑस्ट्रेलियात स्थायिक होऊन ज्योतिषी म्हणून प्रसिद्ध आहे, (त्याची नाशिकला शाखा नाही)
बालपणी फुगडी खेळताना, “चहा बाई चहा, गवती चहा, आम्हा मैत्रिणींची फुगडी पाहा” या गाण्याने झालेला चहाचा परिचय. ज्या वयात चहाची चवही माहीत नव्हती. पण गाण्यातून मात्र परिचय होता. त्याच वेळी घरात स्टोव्ह वर चहा मोठ्या पातेल्यात ठेवला जायचा त्या काळी, मी लहान असताना एकत्र कुटुंब पद्धती होती. एकत्र म्हणजे आई, वडील आणि मुलं नव्हे तर सगळे काका, त्यांची मुले असे मोठे कुटुंब असायचे. आणि चहाला बुडबुडे आलेत का? हे बघायला कोणीतरी सांगायचे. आणि ते छोटे मोठे कसे आलेत हे हात, गाल याच्या मदतीने सांगितले जायचे. आणि आत्या किंवा काकू चहा किती उकळला आहे ते ओळखायच्या. मग त्यात दूध घालून झाकण ठेवून थोडा वेळ मुरवायचा. मग दुसऱ्या पातेल्यात गाळून एकेकाला दिला जायचा.
असा चहाचा परिचय! पण प्यायला मात्र बंदी. चहा पिऊन काळी पडशील अशी भीती दाखवली जायची. अजूनही हे कळले नाही, चहा न पिता रंग मात्र चहा सारखा झाला कसा?
मोठे झाल्यावर कळले, इतक्या लहानपणी ज्याचा परिचय झाला तो चहा आपला नाहीच! कोणी एक शेन नुंग नामक चिनी शासक उकळते पाणी घेऊन झाडाखाली बसले होते. आणि अचानक झाडाचे पान त्यात पडले आणि त्या पाण्याचा रंग व चव बदलली हाच तो पहिला चहा. नंतर असेही वाचले, काही बौद्ध भिख्खू ध्यानाला बसताना विशिष्ठ झाडाची पाने खायचे, त्यामुळे त्यांना झोप येत नसे. हाच तो चहा व त्याची पाने. नंतर त्यात साखर, दूध घालून आपला चहा तयार झाला. आणि विविध नावांनी ओळखला जाऊ लागला. आसाम, दार्जिलिंग, निलगिरी अशी नावे घेऊन आला. पण आम्हाला हे काहीच माहिती नसायचे. आम्ही पुण्यातल्या जगप्रसिद्ध महाराष्ट्र टी डेपो समोर रांगेत उभे राहून फॅमिली मिक्सचर मिळाला की धन्यता मानणार. हाच आमचा चहा!
दिवसेंदिवस त्यात विविध पदार्थ मिक्स होऊन विविध उपयोगाचे, चवीचे चहा तयार झाले. आणि आता तर फारच विविधता घेऊन विविध नावांनी चहा येत आहेत. आणि त्याचे दुष्परिणाम होऊ नयेत याची पुरेपूर काळजी घेऊन चहाचे कप आकाराने लहान होत चालले आहेत. अगदी पोलिओ डोस घेतल्या प्रमाणे वाटते.
हे असे मसाला, गवती, आले, विलायची चहा घेता घेता एक दिवस आईस टी समोर आला. आणि गरम, कडक चहाच्या कल्पनेला पुन्हा धक्का बसला. आणि आता तर आपली चहा पावडरच चहातून गायब झाली. आणि याला चहा कसे म्हणावे? हा माझ्या बाल बुध्दीला प्रश्न पडला. मग धाव घेतली गुगल बाबांच्या कडे! त्यांनी सांगितले चहा/टी म्हणजे कोणतीही पाने उकळली की झाला टी आणि आताचे टी बघून गरगरलेच! कारण काही चहा मध्ये पाने पण नाही तर चक्क फुले, काहित झाडाच्या खोडाची साल असे वापरलेले असते.
१५ डिसेंबर हा दिवस मूळचा ‘आंतरराष्ट्रीय चहा दिवस’ म्हणून साजरा केला जातो. २००५ मध्ये भारतात (नवी दिल्ली) या दिवसाची सुरुवात झाली. ज्याचा मुख्य उद्देश चहा उत्पादक देशांमधील कामगारांच्या हक्कांना आणि चहा उद्योगाला प्रोत्साहन देणे हा होता. तथापि संयुक्त राष्ट्राने (UN) भारताच्या प्रस्तावानुसार २१ मे हा दिवस अधिकृत ‘आंतरराष्ट्रीय चहा दिवस’ म्हणून घोषित केला आहे. २१ मे रोजी बहुतांश देशांमध्ये चहाचा हंगाम सुरू होत असल्यामुळे हा बदल करण्यात आला.
असे चहाचे अवतार बघता बघता आपल्या चहाचे अस्तित्व धोक्यात आले की काय अशी भीती वाटू लागली आहे. आणि मग चहा, पोहे कार्यक्रमात काय दिले जाणार? आणि चाय पे बुलाया है या ऐवजी कोणते पेय येणार? आणि हाच चहा कोणत्या स्वरूपात मिळणार? आणि चहाच्या टपरीवर गप्पा मारत काय प्यायचे? घरी आलेल्या पाहुण्यांना काय द्यायचे? असे बरेच प्रश्न मनात आहेत. पण सध्या तरी याची काळजी नाही. अजून तरी हाच चहा प्रचलित आहे. आणि चहाला भेटू या! हे आमंत्रण अजून तरी कायम आहे.
☆ “दृढ निश्र्चयाचा महामेरू ” – इंग्लिश लेखक : अज्ञात ☆ मराठी अनुवाद व प्रस्तुती – श्री मोहन निमोणकर ☆
– – आपल्या उदाहरणाने लाखो लोकांना स्फूर्ती आणि हिंमत देणारी ही एक सत्यकथा आहे.
1983 मध्ये मेरठ येथे जन्मलेल्या इरा सिंगला यांना जन्मतःच पाठीच्या कण्याच्या एका दुर्धर आजाराने ग्रासले होते. त्यांच्या हातांच्या हालचालींना काही बंधने आली होती. मात्र अशा अवस्थेतही त्यांच्या आई वडिलांनी त्यांना कुठलीच वेगळी आणि विशेष वागणूक दिली नाही. आणि म्हणूनच त्या आपले कॉम्प्युटर इंजिनिअरिंगचे शिक्षण पूर्ण करू शकल्या. शिवाय नंतर दिल्ली विद्यापीठाची m. b. a. ची पदवीही मिळवू शकल्या, आणि लगेचच कॅडबरी इंडिया या नामांकित कंपनीत strategic manager म्हणून व कोकाकोला कंपनीत मदतनीस म्हणूनही त्यांनी काम सुरू केले.
2009 मध्ये त्यांनी I. A. S. होण्याचे ठरविले आणि 2010 मध्ये पहिल्या प्रयत्नातच त्या U. P. S. C. ची सिव्हिल सर्विस मधील परीक्षा यशस्वीपणे पास होऊ झाल्या.
त्यांना भारतीय महसूल विभागाची (Revenue Dept.) जबाबदारी देण्यात आली.. पण सरकारकडून, ‘शारीरिक दृष्ट्या असमर्थ’.. हा निकष लाऊन त्यांना नाकारण्यात आले.. सरकारतर्फे असे सांगण्यात आले की त्यांच्यातील गंभीर स्वरूपाच्या शारीरिक व्यंगामुळे त्यांच्या हालचालींवर मर्यादा आहेत.. एखादी गोष्ट ढकलणे.. ओढणे.. किंवा उचलणे या क्रिया त्या करूच शकत नाहीत, आणि म्हणून I. A. S. Officer म्हणून काम करण्यास त्या सक्षम नाहीत.
या गोष्टीचे त्यांना अतिशय दु:ख झाले. पण अतिशय निश्चयाने त्यांनी ‘केंद्रीय प्रशासकीय न्यायाधिकरण’ या विशेष अर्धन्यायिक संस्थेकडे सरकारच्या या निर्णयाविरुद्ध तक्रार नोंदवली. बराच काळ लोटला पण सरकार काही त्यांच्या भूमिकेत बदल करायला तयार नव्हते….. आणि आता इराही थांबायला तयार नव्हत्या…
… 2011 साली त्या पुन्हा यूपीएससी च्या परीक्षेला बसल्या आणि पासही झाल्या. या वेळी त्यांना रेल्वे विभाग देण्यात आला, पण पुन्हा त्याच शारीरिक व्यंगाच्या सबबीखाली यावेळीही त्यांना नोकरीसाठी अपात्र ठरविण्यात आले.
2013 साली त्या पुन्हा एकदा UPSC च्या परीक्षेला बसल्या आणि अर्थातच पासही झाल्या. पण याही वेळी सरकारकडून पुन्हा तेच कारण दिले गेले. जगातील सर्वात कठीण असलेल्या एका परीक्षेत एक मुलगी तीन वेळा उत्तम गुणांनी पास होते, पण तिच्यातील शारीरिक व्यंगामुळे नोकरी करण्यास ती असमर्थ आहे हेच दरवेळी अधोरेखित केले गेले.. ही खरोखर फार खेदाची आणि तितकीच संतापजनक बाब आहे.. आणि याही वेळेस केंद्रीय न्यायाधिकरणाकडून त्यांना न्याय मिळाला नाही.
– – आता प्रकरण न्यायालयात गेले. दरम्यान 2014 साली त्या पुन्हा एकदा UPSC च्या परीक्षेस बसली. या वेळेस एक विशेष गोष्ट घडली… त्या नुसत्या पासच झाल्या नाहीत, तर संपूर्ण जगातल्या सर्वात जास्त कठीण समजल्या जाणाऱ्या या परीक्षेत त्या सबंध भारतात पहिल्या आल्या. आजपर्यंतच्या यूपीएससीच्या इतिहासात प्रथमच इतके जास्त गुण त्यांना मिळाले होते.. म्हणजे एकूण 2025 पैकी 1082 गुण !
… आता मात्र सरकारला त्यांचा पवित्रा बदलावाच लागला आणि इरा यांची अलीपुर, नवी दिल्ली येथे “सब डिव्हिजनल मॅजिस्ट्रेट” म्हणून नेमणूक झाली. या नेमणुकीच्या पहिल्याच वर्षात त्यांनी जवळजवळ 340 बालमजुरांचे जीव वाचवले होते. त्यांना सक्तीने बालमजूर म्हणून पाठविले जात असताना इरा यांच्या सक्त आदेशानुसार त्यांची सुटका करून त्यांना त्यांच्या कुटुंबियांच्याकडे सुपुर्द करण्यात आले होते…
आणि इथेच सरकारची खात्री झाली की IAS Officer ची जबाबदारी स्वीकारल्यावर त्या उत्तम काम करू शकतात… त्यांचे शारीरिक व्यंग कुठल्याही कामात अडसर ठरत नाही.
सध्या त्या अरुणाचल प्रदेशात अतिरिक्त सचिव म्हणून काम करताहेत. या शिवाय त्या भारत सरकारच्या न्याय आणि अधिकारी मंत्रालयातील दिव्यांग विभागाच्या मुख्य प्रतिनिधी म्हणूनही काम पाहत आहेत.
… या व्यतिरिक्त महिला व बाल संगोपन आणि नीती आयोग यांच्या मुख्य प्रतिनिधी, केंद्रीय निवडणूक मंडळाच्या सुलभ निवडणुकीच्या राष्ट्रीय मंडळावर प्रतिनिधी म्हणूनही त्या कार्यरत आहेत.
अशा या जिद्दी आणि संयमी आणि प्रचंड बुद्धिमान असलेल्या इरा सिंघल यांनी तरुणांना केलेला उपदेश खूपच बोलका आहे.
त्या म्हणतात…
” तुमची स्वप्ने दुसरे कोणीतरी सत्यात उतरवून देईल याची वाट बघत कधीच थांबू नका.. त्यासाठी तुम्ही स्वतः प्रयत्नशील रहा “.
दृढ निश्चय आणि दुर्दम्य हिंमत यांचे मूर्तिमंत उदाहरण म्हणायला हवे अशा IAS ऑफिसर इरा सिंघल यांची ही सत्य गोष्ट लाखो लोकांना प्रेरणादायी ठरेल यात शंकाच नाही.
इंग्लिश लेखक : अज्ञात
मराठी अनुवाद व प्रस्तुती : मोहन निमोणकर
संपर्क – सिंहगडरोड, पुणे-५१ मो. ८४४६३९५७१३.
≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈