मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ तो दिवस होता ६ डिसेंबर १७३५! – माहिती संग्राहक : अज्ञात ☆ प्रस्तुती : डॉ. ज्योती गोडबोले ☆

डॉ. ज्योती गोडबोले 

? इंद्रधनुष्य ?

☆ तो दिवस होता ६ डिसेंबर १७३५! – माहिती संग्राहक : अज्ञात ☆ प्रस्तुती : डॉ. ज्योती गोडबोले

साल असावं १७३५…लंडनमधले संध्याकाळचे पाच वाजले होते.. सेंट जॉर्ज हॉस्पिटलच्या दगडी भिंतींना थंडीनं जणू गोठल्या होत्या पण बालविभागातून येणारा आरडाओरड्याचा आवाज मात्र थांबण्याचं नावच घेत नव्हता..

“मला मरायचं नाही.. आई.. मला वाचवऽऽऽ” अकरा वर्षांचा कोवळा विल्यम ब्लॅकमन बेडवर वेदनेनं अक्षरश: तडफडत होता..

त्याचा चेहरा जणू आगीच्या भट्टीतून आल्यासारखा लालबुंद झाला होता, डोळे पांढरेफटक पडले होते आणि पोटात बेंबीच्या खाली उजव्या बाजूला भयंकर वेदना होत होत्या..

पोट कडक झालं होतं, जिथं दुखत होतं तिथं एक कडक गठ्ठा तयार झाला होता, हात लावायचा उशीर बंदुकीतून गोळ्या निघाव्या तश्या उलट्या सुरू..

एव्हाना तापही १०४ वर पोहोचला होता, प्रत्येक श्वास घेताना त्याच्या तोंडून नुसता आक्रोश बाहेर पडत होता..

बाहेर व्हरांड्यात उभ्या असलेल्या शल्यचिकित्सकांनी खाली मान घालत नकारात्मकपणे हलवली;हर्निया बर्स्ट झालाय..

वेदनेचा शेवटचा टप्पा.. हा थोड्याच वेळचा पाहुणाय.. ”

तेवढ्यात गर्दीतून एक माणूस पुढं आला. लांब काळा कोट, काळी हॅट, डोळ्यात चमक असलेला क्लॉडियस एमॅंड..

राजाचा वैयक्तिक शल्यचिकित्सक, युद्धभूमीवर शेकडो गोळ्या काढणारा, हातं कापणारा पण कधीही मागं न हटणारा.. एखाद्या योद्ध्यासारखा..

तो फक्त एक वाक्य बोलला, ”त्याला ऑपरेशन थिएटरमध्ये न्या.. मी बघतो.. ” 

सर्व एकमेकांकडं बघू लागले.. ”पण सर… ही केस हाताबाहेरंय.. आतडं फिरलंय.. कुणीही हात लावत नाहीये.. ”

क्लॅाडियसनं डोळे वटारले, ”मी म्हणालो ना, मी करतोऽऽ”

ऑपरेशन थिएटरमधे फक्त तेव्हाच्या मंद दिव्यांचा पिवळा प्रकाश पसरला होता.. विल्यमला लाकडी टेबलावर बांधलं गेलं.. त्याचे हात-पाय घट्ट दोरीने बांधले आणि तोंडात कापडाचा बोळा ठासून दिला म्हणजे ओरडताना जीभ चावणार नाही आणि ओरडण्याचा आवाजही येणार नाही आणि भूल??  तेव्हा भूलशास्त्र विकसित झालं नव्हतं, फक्त एक मोठा ग्लास अफूचं पाणी पाजलेलं होतं आणि नातलगांनी देवापुढं हात जोडले होते..

क्लॅाडियसन् चाकू हातात घेतला. त्याचे सहाय्यक जाम घाबरले होते, भर थंडीत त्यांना घाम फुटला होता.. ”पण.. सर.. जर आतडं फाटलं तर…” कुणीतरी चाचरत पुटपूटलं..

“मग मरू द्या दोघंही.. पण मी हार मानणार नाही. ”

पहिला चीरा पडली आणि रक्ताची चिळकांडी उडाली. चाकू खोलवर गेला होता.. आत जे काही दिसलं ते बघून सगळे जागीच थिजले..

एक हर्नियाचं पाऊच आणि त्यात अडकलेला अन् सुजून टम्म झालेला काळानिळा ॲपेंडिक्स.. आणि फक्त एवढंच नव्हतं..

त्यातून चमकली एक चंदेरी पिन.. या पठ्ठ्यानं कधीतरी खेळता-खेळता गिळलेली..

पिन थेट ॲपेंडिक्समध्ये घुसली होती आणि तिथं प्रचंड संसर्ग झाला होता.. ॲपेंडिक्स फाटून हर्नियात अडकला होता.. मृत्यूचं परफेक्ट जाळं तयार झालं होतं..

क्षणभर क्लॅाडियसचाही हात थरथरला.. फक्त एक सेकंद तो दात-ओठ खात म्हणाला.. हा भागच कापायचाय..

पूर्ण.. शेवटपर्यंत..

चाकू फिरला.. ॲपेंडिक्स बाहेर काढलं गेला.. त्याच्यातून ग्लासभर पस निघाला त्याची दुर्गंधी पसरली अन् एक सहाय्यक बेशुद्ध होऊन खाली कोसळला..

शेवटचा टाका पडला…रक्त थांबलं…विल्यम अजून श्वास घेत होता.. हळूहळू.. पण घेत होता..

रात्रभर क्लॅाडियस त्या मुलाच्या बाजूला बसला राहिला..

सकाळचे सात वाजले तेव्हा विल्यमने डोळे किलकिले केले आणि हळू आवाजात म्हणाला, ”मला.. दुखत नाहीये आता…”

क्लॅाडियसच्या डोळ्यात पाणी तरळलं.. त्यानं आवंढा गिळत फक्त मान हालवली..

ती रात्र आणि तो चीरा वैद्यकीय इतिहासात कायमचा कोरला गेला.. जगातली पहिली यशस्वी ॲपेंडिसेक्टॉमी..

एका अकरा वर्षांच्या कोवळ्या मुलानं आणि एका धाडसी शल्यचिकित्सकानं मृत्यूला चक्क मागं लोटलं होतं..

आज आपण जेव्हा ॲपेंडिक्सचं ऑपरेशन म्हणतो तेव्हा हसतो.. पण त्या रात्री लंडनच्या त्या अंधाऱ्या खोलीत खरंच एक युद्ध झालं होतं अन् त्या युद्धात माणूस जिंकला होता..

तो दिवस होता ६ डिसेंबर १७३५!

#Doctors_Diary

***

माहिती संग्राहक : अज्ञात

प्रस्तुती : डॉ. ज्योती गोडबोले 

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित / मंजुषा मुळे/ गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – प्रतिमेच्या पलिकडले ☆ जीवनाची शाळा – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – सुनीला वैशंपायन ☆

सुनीला वैशंपायन 

? प्रतिमेच्या पलिकडले ?

☆ जीवनाची शाळा –  लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – सुनीला वैशंपायन 

ते पावसाचे थेंब ना… शेवटी एका ओळीत बसले. शाळेतल्या बाई वर्गात आल्या की एका क्षणात कसा सगळा कल्ला थांबतो आणि सगळी मुलं एका रांगेत उभी राहतात, अगदी तसं…

मी गंमत म्हणून त्यातल्या एका थेंबाला विचारलं,

“काय रे… सरीबाई ओरडल्या का? “

थेंब हसला. पानाच्या टोकावरून किंचित डोलला. मग म्हणाला,

“नाही हो… सरीबाई ओरडत नाहीत कधीच. त्या फक्त शिकवतात. “

मी चकित झाले…

तो पुढे म्हणाला,

“आम्ही आकाशातून उतरताना प्रत्येकजण आपापल्या मनाचे राजे असतो. कुणाला वाऱ्याबरोबर उधळून जायचं असतं, कुणाला मातीला कवटाळायचं असतं, कुणाला नदी व्हायचं असतं… पण जेव्हा एखाद्या पानावर येऊन विसावतो ना, तेव्हा कळतं— एकट्याने चमकण्यात फारसा अर्थ नसतोच. सोबत बसण्यात वेगळंच सौंदर्य असतं. “

त्याच्या त्या वाक्याने माझ्या मनात कितीतरी आठवणी हलक्या सरींसारख्या बरसू लागल्या.

लहानपणी आपणही असेच होतो ना… एकाच बाकावर बसणारे, एकाच डब्यातला घास वाटून खाणारे, शिक्षा झाली तर एकत्र उभे राहणारे. मोठं होत गेलो आणि प्रत्येकाने आपापल्या दिशेने वाहायला सुरुवात केली. कुणी यशाच्या डोंगरावर जाऊन थांबलं, कुणी जबाबदाऱ्यांच्या वाळवंटात हरवलं, कुणी गर्दीत असूनही एकटं पडलं.

थेंब पुन्हा म्हणाला,

“रांग म्हणजे शिस्त नाही गं… रांग म्हणजे दुसऱ्याला जागा देण्याची संस्कृती. स्वतःचं अस्तित्व जपतानाही दुसऱ्याच्या अस्तित्वाला धक्का लागू न देण्याचं नाव रांग. “

मी त्या पानाकडे पाहिलं.

प्रत्येक थेंब स्वतंत्र होता. प्रत्येकाचं प्रतिबिंब वेगळं होतं. तरीही कुणी कुणाला ढकलत नव्हतं. कुणी दुसऱ्यापेक्षा मोठं दिसायचा प्रयत्न करत नव्हतं. सगळे एका अदृश्य मर्यादेचं भान ठेवून शांत बसले होते.

किती विलक्षण आहे निसर्ग!

जिथे माणसाला शिस्त शिकवण्यासाठी नियम लिहावे लागतात, तिथे पाण्याचा प्रत्येक थेंब कोणतंही पुस्तक न वाचता जगण्याचं तत्त्वज्ञान जगत असतो.

थेंब शेवटी अलगद म्हणाला,

“आम्ही पडतो ना म्हणून झाडं हिरवी राहतात. आम्ही थांबतो ना म्हणून पानं सुंदर दिसतात. आणि आम्ही निघून जातो म्हणून पुन्हा नव्या सरींना जागा मिळते. आयुष्याचं रहस्य एवढंच आहे— वेळ आली की बरसायचं, वेळ आली की थांबायचं, आणि वेळ झाली की शांतपणे निघून जायचं. “

एवढं बोलून तो थेंब अलगद पानाच्या टोकावरून निसटला… तेंव्हा

मातीने त्याला मिठीत घेतलं.

आणि मला जाणवलं—

शाळेतल्या बाई खरंच ओरडत नसत. त्या फक्त मुलांना एकत्र उभं राहायला शिकवत असत.

बहुतेक… पावसाच्या सरीबाईही तेच शिकवतात.

एकटं चमकणं म्हणजे मोठेपण नसतं;

एका ओळीत, एका मनाने, एकमेकांना न ढकलता जगणं— हीच खरी जीवनाची शाळा असते.

लेखक : अज्ञात  

प्रस्तुती – सुनीला वैशंपायन 

≈ संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित / मंजुषा मुळे/ गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ मला समजलेली संत तुकारामांची अभंग गाथा… भाग – ३० ☆ अरुणा मुल्हेरकर ☆

अरुणा मुल्हेरकर

? विविधा ?

☆ मला समजलेली संत तुकारामांची अभंग गाथा… भाग – ३० ☆ अरुणा मुल्हेरकर ☆

(सामान्यांविषयी तुकारामांचे मत)

आजच्या भागात समाजातील सामान्य जनतेविषयी तुकाराम महाराजांचे काय मत होते, त्याविषयीच्या अभंगांचा विचार करू. सामान्य म्हणजे तुमच्या आमच्यासारखे, संसारात गुरफटलेले, एका ठराविक चक्रातून अहोरात्र फिरणारे.

आपल्याच फुंदे/ जेथे तेथे घेती छंदे//

पडला सत्याचा दुष्काळ/ बहु फार झाली घोळ//

विश्वाचे माठ/ त्याचे कपाळी ते नाट//

तुका म्हणे घाणा/ मूढा तीर्थी प्रदक्षिणा//

 या अभंगाचा अर्थ काय? तर तुकारामांच्या मते असे अनेक लोक आहेत की ते त्यांच्या गर्वाने प्रत्येक वेळी दुराग्रह धरतात. परमार्थातील खरी तत्वे काय आहेत ती त्यांना समजली नसल्यामुळे सगळाच घोळ होतो. या नश्वर जगताचा खोटा अभिमान धरून त्यांचे आचरण चालू असते. उदाहरणार्थ- आपल्याला आवडलेली वस्तू न मिळता जर ती दुसऱ्याला मिळाली, तर अत्यंत दुःख होते, पण हे कळत नाही की त्या वस्तूचे अस्तित्व किती काळ असणार आहे? मग विनाकारण दुःख का करायचे आणि स्वतःस त्रास करून का घ्यायचा? म्हणून तुकाराम महाराज म्हणतात की जसा घाण्याचा बैल घाण्याभोवती फिरतो तसा तो मूर्ख मनुष्य जगातल्या सर्व तीर्थांना प्रदक्षिणा घालत बसतो, परंतु त्याच्या अशा वागण्याने त्याला हरीच्या प्राप्तीचे भान आणि ज्ञान नसते.

 अहंकार तो नासा भेद/ जगी निंद्य ओवळा//

 नातळे तो धन्य यासी/ जाला वंशी दीपक//

करवितो आत्महत्या/ नेदी आत्मा आतळो//

तुका म्हणे गुरुगुरी / माथा थोरी धरुनी//

या अभंगात महाराज जनतेला हेच समजावून सांगत आहेत की माणसाचा अहंकार, म्हणजे मी पणा, हे माझे आहे, हे मी केले आहे, हा गर्व

त्याचा विनाश करतो. माणसामाणसात भेदभाव निर्माण करणारा अहंकार अगदी मलीन आहे, तो ओवळा म्हणजे अशुद्ध आहे, निंदनीय आहे. सगळा घात या अहंकारानेच केला आहे. ज्याने या अभिमानाचा विटाळ होऊ दिला नाही, त्यानेच वंशाचे नाव उज्वल केले आहे व तोच धन्य आहे असे समजावे. अहंकारानेच आत्मा स्वतःचा अपारपणा विसरतो आणि या मर्यादित देहाला कवटाळतो. जसा काही तो आत्मघातच करतो. या अभिमानामुळेच खऱ्या श्रीहरीची भेट होऊ शकत नाही. यामुळे माणूस स्वतःकडे मोठेपणा घेऊन उगीचच गुरगुरत राहतो.

तुकाराम महाराजांचे सामान्य माणसांना कळकळीचे हेच सांगणे आहे की आपण सामान्य माणसे म्हणजे एक साधन आहोत, कर्ता- करविता तो एक श्रीहरीच आहे.

आस निसरली गोविंदाचे भेटी/

सवंसारी तुटी पुढीलिया//

पुढे पाठविले गोविंद गोपाळ/

देऊनी चपळ हाती गुढी//

हाका आरोळी या देऊनी नाचती/

एक सादाविति हरी आला//

आरंधी पडिली होती तया घरी/

संकीर्ण त्या नारी नरलोकां//

लोकां भूक तहान नाही निद्रा डोळा/

रूप वेळोवेळा आठविती//

आहा कटा मग करिती गेलिया/

आधी ठावा तया नाही कोणा//

* आधी चुकी मग घडे आठवण/*

* तुका म्हणे जन परिचय*//

सर्वसामान्य माणसांची पद्धतच आहे, की कोणतीही गोष्ट करताना सखोल विचार न करता ती करायची. कधी कोणाच्या सांगण्यावरून करायची, नंतर त्याचे परिणाम काय होतील याचा सारासार विचार करायचा नाही आणि नंतर अंगाशी आले की देवाला आळवायचे. आपल्याकडे म्हणच आहे करून करून भागले अन् देवपूजेला लागले संत तुकाराम नेमकी सामान्य जनांची हीच ओळख त्यांच्या या अभंगातून देत आहेत.

ते म्हणतात की, गोविंदाची भेट झाल्याने सर्व आशा नाहीशी होऊन पुढच्या संसाराचा संबंध सुटला. गोविंदाने चपळ गोपाळांच्या हाती पताका देऊन त्यांना पुढे पाठवले. मोठमोठ्याने हाका, आरोळ्या देऊन ते नाचू लागले व एकमेकांना हरी आला म्हणून सावध करू लागले. आपापल्या घरी ते स्त्री-पुरुष उद्विग्न होते. त्या लोकांची तहानभूक निद्रा नाहीशी होऊन ते वेळोवेळी हरीचे रूप आठवीत असत. हरि डोहात गेल्यावर कृष्ण किती चांगला होता म्हणून आक्रोश करू लागले परंतु पूर्वी त्याचे मोठेपण कोणी जाणत नव्हते. तुकाराम महाराज हेच सांगतात की आधी चुका करायच्या नंतर पश्चातापाने पोळायचे हा जगाचा स्वभावच आहे.

भारवाही न ओळखती या अनंता/

जवळी असता अंगसंगे//

 अंगसंगे तया न कळे हा देव/

कळोनी संदेह मागुताला//

मागुते पडती चिंतेचिये डोही/

जयाची हे नाही बुद्धी स्थिर//

बुद्धी स्थिर राहो नेदी नारायण/

आशाबद्ध जन लोभिकांची//

लोभिका न साहे देवाचे करणे/

तुका म्हणे तेणे दुःखी होती//

या अभंगात साध्या सरळ संसारी माणसाचे वर्णन महाराजांनी केल्याचे आपण पाहतो. जी माणसे प्रपंचाचा गाडा वाहत आहेत, ती माणसे परमेश्वर कितीही जवळ असला तरी त्याला पाहू शकत नाहीत. देहात असलेल्या देवाला ती ओळखत नाहीत. अंग संगतीने असलेला देव त्यांना कळत नाही आणि यदाकदाचित समजलाच तर त्याविषयी त्यांच्या मनात संशय निर्माण होतो. ज्यांची बुद्धी स्थिर नाही ते काळजीच्या डोहात बुडतात. जे लोभी आहेत, नारायण त्यांची बुद्धी स्थिर होऊ देत नाही. लोभी माणसांना देवाचे हे कृत्य सहन न झाल्यामुळे ते कायम दुःखीच राहतात.

थोडक्यात सांगायचे तर संसारात राहूनही लोभ, मोह… इत्यादी शड्रिपुंना दूर ठेवले तर हरिनारायण आपली बुद्धी स्थिर ठेवील आणि देहातील देवाची जाणीव होऊन सर्व दुःखे नाश पावतील.

क्रमशः… ३० 

© अरुणा मुल्हेरकर 

डेट्राॅईट (मिशिगन) यू.एस्.ए.

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ डॉक्टर फॉर बेगर्स ☆ “हा मीच तो… आणि तो हाच तो…!” ☆ डॉ अभिजीत सोनवणे ☆

डॉ अभिजीत सोनवणे

© doctorforbeggars 

? मनमंजुषेतून ?

☆ डॉक्टर फॉर बेगर्स ☆ “हा मीच तो… आणि तो हाच तो…!☆ डॉ अभिजीत सोनवणे ☆

– – भीक मागणाऱ्या वृद्धांमध्ये बसून टगेगिरी करणारा आणि त्यांना त्रास देणारा तो हाच तो…

– – माझ्या कामात उगीचच अडथळे निर्माण करणारा तो हाच तो…

… आणि खूप समजावून सांगून, कधी सांभाळून घेणारा हा मीच तो…

 

– – अंगकाठी बारीक परंतु कोणतीही गुन्हेगारी करण्यास न घाबरणारा तो हाच तो…

– – आई वडील दोघेही नाहीत कोणतेही संस्कार न झालेला तो हाच तो…

– – एके दिवशी माझ्या देखत एका वृद्धाला थोबाडीत मारणारा, तो हाच तो…

… आणि माझा ताबा सुटला, शेजारी पडलेला दांडका, त्याच्या दिशेने जोराने फेकलेला…

हा मीच तो…

 

– – हेतू नव्हता, परंतु डोळ्याच्या शेजारी दांडक्याने झालेली मोठी जखम… तो हाच तो…

… आणि जीव आणि डोळा थोडक्यात वाचला… घाबरून गेलेला मी हाच तो…

 

– – रागाने त्याने पायातली चप्पल मला फेकून मारली, या चपलीचा नेम चुकवणारा तो मीच तो…

 

– – पुनः मांडीवर डोकं घेऊन जखमेचे ड्रेसिंग करणारा हा मीच तो…

– – ड्रेसिंग करता करताही मला शिव्यांची लाखोली वाहणारा हा तोच तो…

 

– – घाणेरड्या शिव्या ऐकून रडणारा तो मीच तो…

– – आपलीच चूक आहे, शिक्षा भोगायला हवी, हा विचार करणाराही तो मीच तो…

 

– – रस्त्यावर कुणीतरी मेलंय आणि कोणीतरी रडतंय असं वाटून त्याचाही तमाशा बघणारा घोळका जमला… तो घोळका हाच तो…

दुसऱ्याची वेदना हि आपली करमणूक आहे, असं समजून सेल्फी घेणारा षंढ घोळका… तोही हाच तो…

 

– – असो, बिना आई बापाचा… वाट चुकलेला मुलगा तो हाच तो…

… आणि आपणच आता आई होऊ, आणि याचा बाप होऊन त्याला जवळ घेऊ असं वाटणारा मीच तो…

 

– – हळूहळू माझी सावली आणि माझी कवच कुंडलं होऊन माझ्या मागे मागे फिरणारा तो हाच तो…

 

– – “तुमी काय बी सांगा सर, आपुन येकांद्याचा खून बी करंल तुमच्यासाटी, तुम्ही फकस्त बोलून बगा” म्हणणारा तो हाच तो…

– – मग त्याला एका खुनाची सुपारी द्यायला, आड बाजूला घेऊन गेलो… हो तोही मीच तो…

– – मी त्याला पाच हजार रुपये दिले, एक खून करायचा आहे म्हटलं, पैसे खिशात ठेवीत उत्साहीत होणारा… तो हाच तो…

 

– – “खून कुणाचा करायचा सर? ” भाबडेपणाने विचारणारा… तो तोच तो…

… आणि “तुझाच माझ्या बाळा” हे तितक्याच भाबडेपणाने सांगणारा… तो मीच तो…

 

– – सर…? तुमी…?? माझा??? खून…????

गोंधळलेल्या अवस्थेत, तोंडावर भीती स्पष्ट, पण अस्पष्ट वाक्य बोलणारा तो हाच तो…

 

… होय माज्या राजा, खून तुझाच करायचा आहे, पण तुझ्या आतल्या गुंडगिरीचा, गुंडाचा, टवाळखोर आणि टगेगिरीचा… तू खूप गोड आहेस रे सोन्या… लोकं लोखंडावर सोन्याचा मुलामा देतात आणि त्याला बाजारात खपवतात… तू तर अस्सल सोनं आहेस रे माझ्या बाळा… लोखंडाची सुरी घेऊन कोणाला धमकावण्यापेक्षा… पडलेल्या कोणालातरी उठवून बघ, मरणाऱ्या कुणाला तरी जगवून बघ, विझलेली एखादी ज्योत पेटवून बघ, एखाद्यासाठी प्रार्थना करून बघ… मग तुजा हातच सोन्याचा होऊन जाईल रे माज्या सोन्या…!

… करशील खून तुझ्यातल्या गुंडाचा…? या पाच हजारात एखादा धंदा चालू कर…

… मी तुजी आई होण्याचा प्रयत्न करंल आन बापबी…!

… भाऊकपणे प्रश्न विचारणारा… तो मी हाच तो…

 

– – रडत म्हणाला “आजपत्तूर मला कुनी सोन्या बाळा राजा म्हनालं नाही… ” तुमी म्हनला… यानंतर अंगावरले सर्व कपडे फाडत, रडत रडत म्हणाला केला खून मी… माझ्यातल्या गुंडाचा… फेकून दिलं मी समदं… समदा नागडा झालो मी. आता नाव द्या मला…! “

 

– – मी काय नाव देणार… आजपासून माणूस म्हणून जन्माला आलेला तो हाच तो… आता त्याच्यावर कसलाही कोणताही शिक्का नव्हता, नावाचा सुद्धा…

… तो… तो… हाच तो…!

 

– – मग गळ्यात पडून कधी आई म्हणत, कधी बाबा म्हणत, रड रड रडला… रडला… खुप रडला… तो हाच तो…

 

आम्ही एका नदीकाठी बसलो होतो… याच नदीकाठी एक डिलिव्हरी झाली… मात्र जन्माला तिघे आले…!

… एक कोणताही शिक्का नसलेलं बाळ… तो हाच तो 

… एक आई आणि एक बाप… तो मीच तो…

… तो सर्वसामान्य माणूस म्हणून कामाला लागला, कमावू लागला… तो हाच तो…

 

… लगीन करायचं हाय, पोरगी मी शोदली हाय, म्हणत माझ्या मागे लागलेला… तो हाच तो…

… लग्न लागलं, वरपक्ष म्हणून एकटाच नाचणारा तो मीच तो…

 

– – लग्नाच्या आधी कानात काही गोष्टी विचारणारा तोच तो…

… लग्नाच्या आधी कानात काही गोष्टी सांगणारा मीच तो…

 

– – लग्न पार पडल्यानंतर हमसून रडू लागणारा तो हाच तो…

… वरपक्ष म्हणून छाती फुगवून उभा असणारा… तो मीच तो…

 

– – त्याला म्हणालो, ‘बेण्या, आज आपण रडायचं नसतंय… वधू पक्षाकडील मंडळी रडतील… रडू दे त्यांना’ हे म्हणणारा वरपक्ष म्हणून निर्ढावलेला मीच तो…

… ‘रडतूस कशापायी… चल नाच तू… ‘ बुटाची लेस आवळत, बापाचा आव आणत बोलणारा मीच तो…

 

– – ‘सर तिच्या बापाची ती येकुलती येक मुलगी व्हती, आपुन आज तिच्या बापाचं काळीज घिवून चाललो, तिच्या बापाला कसं वाटलं आसंल, पोरी वाचून त्यो आता रोज कसा जगंल? म्हनुन मी रडतूय सर’…

हे म्हणणारा, सोन्याचे हात झालेला तो हाच तो…

 

– – एकेकाळी याच मुलाने मला चप्पल फेकून मारली होती,

आज बरोबर नेम धरून ती माझ्या थोबाडावर बसली होती…!

 नेम वर्मी लागला होता, आता डोळ्यात पाणी आलेला हा मीच तो…

 

– – एकेकाळी सूरी घेऊन कुणाच्या तरी काळजावर बिनधास्त वार करणारा हाच तो…?

… आज मुलीच्या बापाच्या काळजाचाही विचार करणारा तो हाच तो…??

 

– – शरमून गेलो… शरमणारा फक्त मीच तो…!

… हा सर्व खेळ, नाटक समजून विंगेत बसून बघणारा मीच तो…!

 

एवढ्या सर्व गडबडीत तो भाबडेपणाने माझ्या कानात म्हणाला, ‘सर लग्नात माजी एक चप्पल हारावली… ‘ 

.. त्याला आता कोणत्या तोंडाने सांगू, एकदा तुझा नेम चुकला होता, आज तो नेम बरोबर माझ्या थोबाडावर लागला आहे, आणि ती चप्पल मी आता माझ्या हृदयात जपून ठेवली आहे… हे सांगणारा मीच तो…

 

मी विषय बदलला, ‘अरे येड्या चपलीचं काय विचारतो, तुम्हा दोघांचा “जोडा” बघ किती छान दिसतोय… बायकोकडे बघ की रं जरा… ‘

तो लाजला… आहा रे… तो… लाजला… बघा तो लाजला… लाजला… तो हाच तो…

… तिघांनी मिळून मग हा फोटो काढला… तो हाच तो…!

– – जाताना मुलीकडचे सर्व रडत होते, त्यात आणखी एक माणूस रडत होता… तो हाच तो…

… आणि… आणि त्याचा माणूस म्हणून झालेला जन्म, आणि तोंडावर मारलेली चप्पल हृदयात घेऊन, अत्यंत समाधानाने त्याच्या मागे मागे चालणारा हा मीच तो…!!!

© डॉ अभिजित सोनवणे

डाॕक्टर फाॕर बेगर्स, सोहम ट्रस्ट, पुणे

मो : 9822267357  ईमेल :  abhisoham17@gmail.com,

वेबसाइट :  www.sohamtrust.com  

Facebook : SOHAM TRUST

≈ संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ आयुष्याचं पण असंच की.. ☆ श्री अमोल केळकर☆

श्री अमोल केळकर

??

☆ आयुष्याचं पण असंच की.. ☆ श्री अमोल केळकर ☆

मागच्याच शनिवारची गोष्ट.

… पिठापूरला जाताना सकाळी 10 च्या सुमारास विजयावाडा जंक्शन आले.

इथे इंजिन बदलते हे कळल्यावर म्हणलं चला बघू प्रोसेस. आमचा डबा ही इंजिना पासून 4- 5 वाच होता.

पूर्वी पुणे स्टेशनवर महालक्ष्मीचे डिझेल इंजिन बदलून इलेक्ट्रिक इंजिन लागायचे आणि मग गाडी मुंबई कडे जायची हे पाहिले होते.

हातात चहाचा कप घेऊन तिथे पोचेपर्यत पहिले इंजिन निघाले होते. समोर दिसणा-या अनेक इंजिना पैकी एखादे येईल म्हणून बघत बसलो. थोड्यावेळाने लक्षात आले जोडणी करणारे रेल्वे कर्मचारी ही नाहीत. कदाचित ते नवीन येणा-या इंजिनातून येतील असे वाटले. दहा – पंधरा मिनिटे झाली काहीच हालचाल नाही, तेवढ्यात घोषणा झाली की कोणार्क एक्सप्रेस सुटत आहे. शिट्टी मारून गार्डने झेंडा दाखवायला सुरवात केली आणि धावत पळत जाऊन गाडी सुटत असताना आमचा डबा पकडला.

इंजिन दुसऱ्या बाजूला लागले होते. पूर्वीच्या अनुभवावरून मनाने खात्री केलेली की इंजिन आम्ही जिथे आहोत तिथेच लागेल.

आयुष्याचं पण असंच नाही का? आपण एक विचार करत असतो पण एका योग्य स्टेशन वर थोडी प्रतीक्षा करायला लावून नियती एका वेगळ्याच मार्गाने, जो आपल्यासाठी कदाचित अधिक चांगला आहे तिकडे नेणार असते.

© श्री अमोल केळकर

बेलापूर, नवी मुंबई, मो ९८१९८३०७७९

poetrymazi.blogspot.in, kelkaramol.blogspot.com, a.kelkar9@gmail.com

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ “मूकं करोति वाचालं!” ☆ श्री संभाजी बबन गायके ☆

श्री संभाजी बबन गायके

? इंद्रधनुष्य ?

मूकं करोति वाचालं! ☆ श्री संभाजी बबन गायके 

मूकं करोति वाचालं!

 – – – एका साधू हृदयी सैनिकाची अजरामर कहाणी!

ती केवळ पाच-सात वर्षांची अजाण बालिका… कोणत्याही काश्मिरी कन्येसारखी छान, सुंदर आणि निष्पाप! रुक्साना तीच नाव… रुखसाना म्हणजे गुलाबी गालांची मुलगी! त्या रात्री तिच्या घरातले सर्वजण निद्रेच्या अधीन असतानाच घराच्या दारावर थाप पडली… तिच्या बाबांनी दरवाजा उघडला. एवढ्या रात्री कोण आलं असावं याचं आश्चर्य वाटून डोळे किलकिले केलेली रुक्साना एके-४७ रायफलींच्या गोळीबाराच्या भयावह आवाजाने खडबडून जागी झाली… ती उठून दाराकडे धावली आणि वडीलांना रक्ताच्या प्रचंड थारोळ्यात पडलेली पाहून जागीच थिजली… जणू बर्फाचा एखादा कडा! रुक्सानाच्या वडिलांचा अतिरेक्यांनी खून केला होता… ते भारतीय फौजेला साहाय्य करतात अशा संशयातून. गोष्ट आहे वर्ष १९९८ ची. या प्रचंड मोठ्या मानसिक धक्क्याने रुक्साना अशी अबोल झाली जणू जन्मत:च मुकी!

इकडे याच महिन्यात एक तरुण लष्करी अधिकारी, विजयंत थापर नेमणुकीस आला होता. विजयंत यांच्या रूपाने थापर कुटुंबातील चौथा पुरुष भारतीय लष्कराच्या सेवेत दाखल झाला होता… वय केवळ २१ वर्षांचं. डॉक्टर कॅप्टन कर्ताराम थापर पणजोबा, आर्मी ऑफिसर जे. के. थापर आजोबा आणि कर्नल वीरेंद्रनाथ थापर वडील आणि आता लेफ्टनंट विजयंत थापर अशी ही वंशवेल होती. मातोश्री तृप्ता या गृहिणी होत्या. वडील १९९९ मध्ये सेवानिवृत्त व्हायचे होते त्याआधी १९९८ मध्ये विजयंत सेनेत दाखल झाले… एक परंपरा पुढे पाऊल टाकीत होती!

बारकुड्या पण देखण्या, तरतरीत सरळ नाक असलेल्या विजयंतला वडिलांनी ‘रॉबिन’ हे लाडाचे नाव दिले होते… विजयंत होताच तसा रॉबिन पक्षासारखा दिसायला नाजूक पण अत्यंत उत्साही… मृदू काळजाचा. अगदी लहानपणापासून विजयंतच्या वर्तनात एखाद्या साधूची झलक दिसे. कधी कुणाला दुखावणे नाही की शब्दांनी घायाळ करणे नाही. जवळच्या वस्तू आनंदाने दुस-याला देऊन मोकळे होणे त्याला सहजी जमायचे. घरी पाळलेल्या श्वानांचे लाड करणे त्याला आवडायचे. पण हाच नाजूक विजयंत त्याच्या हातात सैनिकी बंदूक आली की एकदम निराळा अवतार धारण करी. तो मोठ्या भावाला ‘पाकिस्तान’ व्हायला लावायचा आणि स्वत: ‘हिंदुस्तान’ बनत युद्धात ‘पाकिस्तान’वर मात करायचा… थापर घराण्यातील आणखी एक तरुण सैनिक होण्याच्या मार्गावर अग्रेसर होत होता! लहानपणी म्हणजे वयाच्या पाचव्या वर्षी विजयंतने त्याच्या वडिलांच्या मांडीवर बसलेला असताना त्यांचे पिस्टल अचूकपणे फायर करून दाखवले होते!

सैनिकी शाळेतून माध्यमिक शिक्षण पूर्ण करून विजयंत प्रतिष्ठित राष्ट्रीय संरक्षण अकादमी, खडकवासला, पुणे येथे सैनिकी अधिकारी प्रशिक्षणास पात्र ठरले. मांसाहार, मद्यपान, धुम्रपान यांपासून आयुष्यभर दूर राहण्याचा संकल्प केलेले, विजयंत हे इंद्रदेवाचे नाव धारण केलेले, धार्मिक उपासनेत रत असणारे विजयंत व्यायाम करून शरीर संपदा कमावण्यात मात्र खूप गंभीर असत. त्यामुळे बारीक चण असली तरी त्यांची शारीरिक क्षमता अतिशय उत्तम होती. त्यामुळे एन. डी. ए. आणि पुढे इंडीयन मिलिटरी अकदामी, देहराडून येथून ते उत्तम गुणांनी उत्तीर्ण झाले. त्यांना खरेतर लढाऊ वैमानिक व्हायचे होते पण २, राजपुताना रायफल्स या पायदळ विभागात त्यांची कारकीर्द घडायची होती… ते वडिलांच्या पावलावर पाऊल टाकीत लढाऊ सैनिक बनले. वडील मराठा लाईट इन्फंट्रीचे अधिकारी होते!

२, राजपुताना त्याच वर्षी जम्मू-काश्मीरमध्ये अतिरेक्यांच्या बंदोबस्तासाठी पाठवली गेली. पंजाब राज्यातील रुपनगर मधल्या नांगल येथे बालपण गेलेला विजयंत नावाचा तरुण आता थेट बर्फाळ प्रदेशात आला होता. कुपवाडा येथे नेमणूक असताना रुक्सानाची घटना घडली. कोमल हृदयाच्या विजयंत यांची आणि रुक्सानाची योगायोगानेच गाठ पडली आणि त्यांचे अबोल मैत्र जुळले! तिच्या घरच्यांनी आता रुक्साना कायमची मुकी झाली, असेच गृहीत धरले होते. मात्र विजयंत साहेबांनी हा समज खोटा ठरवला… आणि चमत्कार करून दाखवला.

धकाधकीच्या लष्करी कारवाया आणि अन्य कामांतून वेळ काढून विजयंत साहेब रुक्सानाची भेट घ्यायचे.. तिला खाऊ द्यायचे आणि तिच्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न करायचे… दुस-या महिन्यात रुक्सानाची वाचा परत आली… देवाची कृपा असेल तर ‘मुकं करोति वाचालं… हा श्लोक खरा ठरला होता!

१९९९. मे महिन्याच्या आरंभी भारत-पाकिस्तान दरम्यान कारगिल युद्ध सुरु झाले… भारतीय हद्दीत विश्वासघात करून घुसखोरी केलेल्या पाकिस्तानी सैन्याला हाकलून लावण्यासाठी भारतीय लष्कराने ‘ऑपरेशन विजय’ हाती घेतले!

युद्धात पराक्रम गाजवण्याची मनोमन इच्छा असलेल्या कॅप्टन विजयंत थापर यांना हे युद्ध म्हणजे lifetime opportunity म्हणजे नशीबाने मिळणारी संधी वाटली नसती तरच नवल.

वीरचक्र विजेते कमांडिंग ऑफिसर कर्नल एम. बी. रबिन्द्रनाथ साहेबांच्या नेतृत्वात आणि कंपनी कमांडर मेजर पद्मपाणी आचार्य यांच्या सोबत विजयंत तोलोलिंग पर्वत पाकिस्तानी सेनेकडून हिसकावून घेण्याच्या कामगिरीवर निघाले. १२ जून, १९९९ची रात्र. मेजर मोहित सक्सेना साहेबांनी चढवलेल्या हल्ल्याला अपेक्षित यश मिळालेले नव्हते, आपली बरीच हानी झालेली होती. पर्वतावर ‘बर्बाद’ नावाचा एक बंकर (खंदक) होता. यात बसून पाकिस्तानी सैनिक भारतीय सैनिकांवर तुफान हल्ला चढवत होते. त्यामुळे पुढे जाण्याचे आपले सर्व प्रयत्न फोल ठरत होते. मग निकराचा प्रयत्न म्हणून याच बंकर वर एकाच वेळी अनेक बोफोर्स तोफांनी तुफान मारा करण्यात आला… आणि त्याच्या आडोशात भारतीय सैनिकांची तुकडी त्या बंकरच्या दिशेने निघाली… समोरून स्वयंचलीत आधुनिक रायफलीमधून अचूक गोळीबार सुरु होता… दगडांचा जमेल तसा आडोसा घेत विजयंत साहेब आणि त्यांचे सहकारी त्या गोळीबाराच्या वर्षावात भिजत पुढे गेले… काहीजण धारातीर्थी पडले! विजयंत साहेबांवरही तुफान गोळीबार झाला… पण ते बचावले… आणि त्यांनी खंदकात झेप टाकली… दोन पाकिस्तानी सैनिकांशी त्यांची झटापट झाली… पण विजयंत यांनी त्यांना यमसदनी धाडले… खरं तर त्यांची शत्रूला जिवंत पकडायची इच्छा होती… पण बाकीचे शत्रूसैनिक पळून जाण्यात यशस्वी ठरले! विजयंत यांनी त्याच रात्री आपल्या रोजनिशीमध्ये या लढाईची थरारक हकीकत लिहिली… दोन शत्रू टिपले… पण शत्रूला जिवंत पकडण्याची मनीषा अपुरी राहिली! पण या चकमकीतील Point 4590 वरील विजय कारगिल लढाईला भारताच्या बाजुने झुकवून गेला! इथे कशमिरी अतिरेकी नव्हते.. संपूर्ण पाकिस्तानी फौज होती… त्यांनी कित्येक महिने आधी तयारी करून ठेवली होती. त्यांच्यापर्यंत पोहोचायला भारतीय सैनिकांना अगदीच चिंचोळी जागा होती… त्यांच्या तोफखान्याच्या मा-यातून पुढे जावे लागत होते… उंच चढण होती, थंडी होती… खाली खोल द-या होत्या!

तोलोलिंग वर भारतीय ध्वज फडकवल्यावर विजयंत साहेबांनी आईशी फोनवर संवाद साधून तिला त्याच्या कामगिरीची खबर दिली होती.

अनेक बलिदाने द्यावी लागली पण आता यशही मिळू लागले होते… भारतीय फौजेचा आत्मविश्वास खूप वाढला होता. २८ जून. आता आणखी मोठी कामगिरी २, राजपुतानाकडे आली. थ्री पिंपल्स, नोळ आणि लोन टेकडी भाग ही तीन महत्त्वाची ठिकाणे काबीज करायची होती. पौर्णिमेची रात्र होती. शुभ्र चांदणे पडले होते.

हल्ल्यावर निघण्यापूर्वी विजयंत यांना काही तरी जाणवले… बहुदा या मोहिमेतून आपण जिवंत परतू शकणार नाही आहोत… कारण त्यांचे अनेक सहकारी माघारी येऊच शकले नव्हते… लढाई थांबणार नव्हती जिंकल्याशिवाय! त्यांनी घाईघाईत एक पत्र लिहायला घेतलं… विजयंत साहेब कारगिल युद्धात लढायला गेले आहेत… हे त्यांच्या घरी ठाऊक नव्हते.

अतिप्रिय पपा आणि आई,… आणि आज्जी!

तुमच्या हाती हे पत्र लागेल तेंव्हा मी स्वर्गातील सुंदर अप्सरांचा पाहुणचार घेत घेत आकाशातून तुमच्याकडे पहात असेन!

मला माझ्या आयुष्याबाबत कोणतीही खंत नाही. खरं तर, पुन्हा मानव देह मिळाला तर मी पुन्हा भारतीय फौजेत भरती होईन आणि मातृभूमीसाठी लढेन!

आपल्या सैनिकांनी जिथे देह ठेवले, ती जागा तुम्हांला शक्य झाल्यास इथे प्रत्यक्ष भेट देऊन एकदा पहा… बघा… देशाच्या भविष्यासाठी तरुण सैनिकांनी त्यांचा सुंदर वर्तमानकाळ कसा अर्पण केला ते!

नवीन सैनिकांना या बलिदानांबद्दल माहिती द्यायलाच हवी. मला आशा आहे, माझे छायाचित्र माझ्या ए कंपनीच्या मंदिरात लावले जाईल… हुतात्मा विजयंत थापर! कारगिल युद्ध, १९९९!

माझे शक्य होतील ते अवयव दान करावेत! अनाथश्रमांना शक्य होतील तेवढ्या देणग्या द्याव्यात. आणि हो… रुक्सानाला दरमहिना रोख रक्कम पाठवीत रहा माझ्यातर्फे… ती आता आणखी छान बोलायला लागली असेल! आणि योगी बाबांचीही भेट घ्या.. त्यांना चरणस्पर्श सांगा माझा!

सैनिकांचे बलिदान विसरू नका! पपा, तुम्हांला माझा अभिमानच वाटेल… तुम्हीही सैनिकच होता. तुम्हांला न मिळू शकलेलं सैन्य शौर्य पदक मला मिळेल…!

आई, तू ——–ला भेटलंच पाहिजे हं! तिची माझी प्रेमकहाणी पूर्ण होऊ नाही शकली या जन्मी. तिला माझ्या शुभेच्छा सांग! तिच्यावर माझं जीवापाड प्रेम होतं!

चला, आता माझ्या डझनभर मित्रांन सोबत घेऊन लढाईला निघायची वेळ झाली आहे… सर्वांना शुभेच्छा… राजा सारखं जगा!

तुमचा रॉबिन…

आणि मरणावर स्वार व्हायला दल निघाले… पाकिस्तानी तोफखाना आग ओकत होता… मग १२० भारतीय तोफा अचूक गोळाबारी करू लागल्या… धुराचे लोट, आगीचा डोंब उसळत होता… विजयंत साहेब त्यातून पुढे निघाले… त्यांचा प्रिय सहकारी शिपाई जगमल सिंह धारातीर्थी पडला… काही वेळाने कंपनी कमांडर पद्मपाणी आचार्य साहेब हुतात्मा झाले… आता विजयंत यांच्या तळपायाची आग मस्तकी गेली! नाईक तिलक सिंग यांना हाताशी घेत ते त्या गोळीबाराच्या वर्षावात सरळ पुढे घुसले! आता शत्रू आणि त्यांच्या केवळ १५ मीटर्स एवढेच अंतर उरले होते… दोन मशीनगन्स यांच्याच दिशेला फायर करीत होत्या… लपायला नीट जागा नव्हती… गोळीबाराला तशाही स्थितीत उत्तर दिले जात होते… यात दीड तास गेला! आता मात्र विजयंत साहेबांचा संयम संपला… आता माघारी फिरणे तर शक्य नव्हतेच… पुढेच जावे!

गोलियां आणि गालियां यांचेही आदान-प्रदान सुरु होते दोन्ही बाजूंनी. पाकिस्तानी म्हणत होते… काफरांनो, तुम्ही काय लढणार आमच्याशी? यावर विजयंत साहेब म्हणत… तुमची इथून पळून जाण्याची संधीही आता निघून गेली आहे… आता आम्हीच तुमचे जनाजे काढू!

त्यांनी पुढे मुसंडी मारली… एवढ्यात मशीनगनचा एक मोठा फायर आला आणि साहेबांच्या मस्तकाचा वेध घेऊन गेला… साहेब त्यांच्या सहका-याच्या बाहुपाशात कोसळले… लहानगा रॉबिन पक्षी आसमंतात कायमचा उडून गेला होता… कधीही न परतण्यासाठी! पुढे भारताने शत्रूला यमसदनी धाडले! पण आपले मोती विखुरले गेले होते… मातीत मिसळून गेले कारगिलच्या पर्वतांवरच्या!

कॅप्टन विजयंत थापर यांच्या वडिलांनी लेकाचा शब्द लक्षात ठेवला… वाढते वय… बिघडणारी प्रकृती यांची तमा न बाळगता… ते तोलोलिंगची चढण चढत त्यांचा लेक जिथे धारातीर्थी पडला त्या ठिकाणाला भेट देतात… दरवर्षी… आई तिथे जाऊ शकत नाही… पण तिच्या मनात मात्र तिचा रॉबिन अजून भरारी घेतच असतो…! मरणोत्तर वीर चक्र देऊन देशाने कॅप्टन विजयंत थापर साहेबांचा गौरव केला आहे. साहेबांच्या आठवणी त्यांच्या कुटुंबाने, मित्रांनी आणि त्यांच्या दलाने मोठ्या प्रेमाने जतन करून ठेवल्या आहेत. तोलोलिंगवर त्यांच्या स्मृती एक छोटे मंदिर उभारून जतन केल्या गेल्या आहेत… आणि त्यांच्या ए कंपनी मंदिराच्या भिंतीवर एक छान, सुरेख तैलचित्र लावलेले आहे… हुतात्मा कॅप्टन विजयंत थापर… दी रॉबिन!

१९९९ मध्ये अर्थात युद्धासाठी कारगिल येथे जाण्यापूर्वी लेफ्टनंट वैजयंत थापर यांनी आपल्या दैनंदिनीमध्ये आयुष्याची रूपरेषा लिहून ठेवली होती… स्वत:शीच काही गोष्टी ठरवून ठेवल्या होत्या…

मी भारताचा ध्वज सतत उंचावत राहीन. मला माझ्या आई-वडिलांचा खूप अभिमान आहे. मी मरणोत्तर नेत्रदान करेन, अवयवदानही करेन. मी धुम्रपान करणार नाही, मांसाहार करणार नाही, अंडी खाणार नाही. मी माझ्या सैनिकांसमवेत राहीन. मी स्वत:ला खाली बघायला लागेल असे वर्तन करणार नाही. मी आयुष्यात एका तरी अनाथ मुलाचा शिक्षणाचा आणि इतर सर्व खर्च करीन… आणि मी मरताना राम स्मरेन!

कॅप्टन विजयंत थापर यांच्या सारखे, वयाच्या एकविसाव्या-बाविसाव्या वर्षी एवढे स्पष्ट विचार, ज्ञान, चारित्र्य कमावलेला सैनिकी अधिकारी आपल्याला आणखी खूप वर्षे लाभायला हवे होते… असे राहून राहून वाटते. त्यांच्या शौर्याच्या कथा काही लोकांना ठाऊक आहेत… पण त्यांची ही वैचारिक बाजू तशी कमी प्रकाशात आलेली आहे. कॅप्टन विजयंत थापर डॉट कॉम या संकेतस्थळावर साहेबांच्या आयुष्याचा अतिशय सविस्तर आणि सुंदर आलेख मांडण्यात आला आहे. इंटरनेटवर साहेबांच्या पालकांनी अनेक विडीओज मधून खूप छान माहिती दिली आहे. कुणाला ना कुणाला तरी देशसेवेसाठी पुढे यावेच लागेल… असेही विजयंत साहेबांचे वडील नेहमी म्हणतात! वरील बरीचशी माहिती मी तिथूनच घेतली आहे. छायाचित्रे साभार. आणखी खूप काही लिहायचे होते. विशेषत: त्यांच्या कुटुंबाविषयी, त्यांच्या वडिलांविषयी. पण त्यासाठी स्वतंत्र लेख लिहावा लागेल.

© श्री संभाजी बबन गायके 

पुणे

9881298260

≈ संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ “सेप्टोलेसेंट म्हणजे काय?…” – लेखक / माहिती संग्राहक : अज्ञात ☆ प्रस्तुती – प्रभा हर्षे ☆

प्रभा हर्षे

? इंद्रधनुष्य ?

☆ “सेप्टोलेसेंट म्हणजे काय?…” – लेखक / माहिती संग्राहक : अज्ञात ☆ प्रस्तुती – प्रभा हर्षे ☆

सेप्टोलेसेंट म्हणजे ७० वर्षांवरील पुरुष किंवा स्त्री, जी वृद्धत्वाचा स्वीकार पारंपरिक पद्धतीने करत नाही, तर जीवनाबद्दलच्या उत्साहासह एक वेगळी जीवनशैली निवडते.

त्यांची वैशिष्ट्ये:

१) ते नेहमी सक्रिय असतात. ते काम करू शकतात, अभ्यास करू शकतात किंवा एखादा नवा उपक्रम निर्माण करू शकतात, ज्यामुळे त्यांना विचार करावा लागतो आणि तो उपयुक्त वाटतो.

२) त्यांचे किमान तीन चांगले मित्र असतात. ते त्यांच्याशी कॉफी, पाणी किंवा वाईनसाठी वारंवार भेटतात.

३) ते आलिशान गोष्टींपासून दूर राहून प्रवास करतात आणि नवीन ठिकाणे व संस्कृती अनुभवतात. पण जीवनातील चांगल्या गोष्टींचा आनंद घेणे ते सोडत नाहीत.

४) ते आपल्या जोडीदार, मुले, नातवंडे आणि नातेवाईकांशी प्रेम, आदर आणि परस्पर सहारा यावर आधारित नाती जोपासतात.

५) ते आशावादी आणि उत्साही असतात. त्यांच्या मनात नेहमी एखादा नवा प्रकल्प किंवा ध्येय असते आणि ते जीवनात अडकून न पडता पुढे जातात.

६) ते आपल्या आरोग्याची काळजी घेतात. ते आजारपणाला जीवनाचा एक भाग म्हणून स्वीकारतात. ते दररोज किमान २० मिनिटे चालतात आणि निरोगी अन्न खातात.

७) त्यांना छोट्या गोष्टींत आनंद मिळतो. तो वाढदिवस असू शकतो, एखादा सोहळा, एखादी आवडती मालिका किंवा एक नवा दिवस. ते दररोज देवाचे आभार मानतात.

८) ते दिवसभरात मिळालेल्या चांगल्या गोष्टींबद्दल कृतज्ञ असतात. ते इतरांचे चांगले करण्याचा प्रयत्न करतात.

९) ते दररोज हसतात. कारण त्या अनेक सुंदर गोष्टींचा आनंद घेतात, ज्या इतरांना दिसत नाहीत किंवा महत्त्वाच्या वाटत नाहीत.

१०) ते आपल्याकडे जे आहे त्यात आनंदाने राहतात, जे नाही त्याची चिंता न करता. म्हणूनच ते स्वतःला करोडपती मानतात.

मी तुम्हालाही “सेप्टोलेसेंट” होण्याचे आमंत्रण देतो.

“वृद्धत्व थांबवणे अशक्य आहे. पण वृद्धत्वाचा सन्मान आणि आदराने स्वीकार करणे हे पूर्णपणे आपल्या हातात आहे.”

लेखक / माहिती संग्राहक : अज्ञात 

संग्राहिका आणि प्रस्तुती : प्रभा हर्षे 

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचतांना वेचलेले ☆ मी कोण? – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – शीतल कुलकर्णी ☆

शीतल कुलकर्णी

📖 वाचताना वेचलेले 📖

☆ मी कोण? – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – शीतल कुलकर्णी 

मी कोण?

नोकरी संपली,

दिनक्रमही गेला,

घरातली गजबजही थांबली,

आणि शांततेच्या प्रतिध्वनीत

मी स्वतःला शोधायला लागलो.

 

मी कोण?

बंगलो बांधले,

फार्महाऊस उभारले,

मोठी-लहान गुंतवणूक केली,

आणि आता?

चार भिंतीत अडकून पडलोय.

 

सायकलवरून मोपेड,

मोपेडवरून मोटार,

मोटारीतून गाडी,

गती आणि स्टाईलच्या मागे धावलो,

पण आता?

हळूहळू पाय रेंगत रेंगत

आपल्या खोलीतच फिरतोय.

 

निसर्गाने विचारलं—

“कोण आहेस रे मित्रा?”

मी म्हणालो,

“मी… फक्त मीच.”

 

राज्य, देश, खंड फिरलो,

पण आज

माझे प्रवास

हॉलपासून स्वयंपाकघरापर्यंतच.

 

संस्कृती, परंपरा जाणून घेतल्या,

पण आता माझ्या कुटुंबाने

मला समजून घ्यावं

अशी इच्छा आहे.

 

निसर्ग हसून म्हणाला—

“कोण आहेस रे मित्रा?”

मी उत्तर दिलं,

“मी… फक्त मीच.”

 

पूर्वी वाढदिवस,

लग्नसमारंभ मोठ्या थाटामाटात केले,

पण आज

फक्त छान झोप लागली,

भूक लागली,

हेच साजरं करतो.

 

सोने, चांदी, हिरे, मोती

सगळं बँकेत गप्प बसलंय.

सूट-बूट कपाटात लटकलेले.

आता फक्त मऊ सुताचे कपडे,

साधेपणातला आराम.

 

इंग्रजी, फ्रेंच, हिंदी शिकलो,

पण आता

माझ्या मायबोलीतच

सुख मिळतं.

 

व्यवसायासाठी

जगभर धावलो,

नफा-तोट्यांची गणितं केली,

पण आज

फक्त आठवणींमध्ये हिशोब करतो.

 

व्यवसाय सांभाळला,

कुटुंब जोडलं,

खूप नाती केली,

पण आता?

शेजारचा साधा-सोपा माणूसच

माझा जिवलग सोबती आहे.

 

नियम पाळले,

शिक्षण घेतलं,

पण आता कळतंय—

खरं महत्त्वाचं काय आहे.

 

जीवनाचे चढउतार अनुभवून,

शांत क्षणी

माझ्या आत्म्यानेच मला सांगितलं:

 

“पुरे झालं आता…

तयार हो प्रवासी,

अंतिम प्रवासासाठी…”

 

निसर्ग पुन्हा हसून विचारतो—

“कोण आहेस रे मित्रा?”

 

मी हळूच म्हणतो:

“अरे निसर्गा,

तूच मी…आणि मीच तू.

एकेकाळी आकाशात झेपावलो,

आता जमिनीलाही

प्रेमाने स्पर्शतो.

मला माफ कर…

एकदा पुन्हा जगू दे मला—

पैशाच्या यंत्रासारखा नव्हे,

तर खराखुरा माणूस म्हणून—

मुलांसह, कुटुंबासह, आणि प्रेमासह.”

 

वरिष्ठ नागरिकांना समर्पित

 संपत्ती एका झटक्यात,

सौंदर्य एका आजारात,

आणि प्रतिष्ठा एका चुकीत

नष्ट होते,

म्हणूनच या तिन्ही गोष्टींचा

कधीही गर्व नको ..!

 

कवी : अज्ञात

प्रस्तुती : शीतल कुलकर्णी

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ महावस्त्राचे पदर – भाग ४ ☆ श्री विश्वास देशपांडे ☆

श्री विश्वास देशपांडे

? विविधा ?

महावस्त्राचे पदर – भाग ४ ☆ श्री विश्वास देशपांडे ☆

(नात्यांचं महावस्त्र : ‘आजी’ (संस्कारांची शिदोरी))

माझ्या कल्पनेतील आजी अशी आहे… 

मायेचे आगर, प्रेमाचा सागर,

ज्ञानाची घागर असे आजी!

आजीची पोतडी गोष्टींनी समृद्ध,

आजीचा बटवा औषधांनी…

 

 शुभ्र केसांचा मऊ अंबाडा, बोलणे तिचे प्राजक्ताचा सडा.

 दातांची जरी कवळी, मनाने सदा राही देवाजवळी.

 

सुरकुत्यांचे जाळे अंगावरी पण

बोलण्यातून फुलती हास्य लकेरी.

 

आईबाबा नसता, आजीचा फिरे हात,

प्रेमाची ती साथ सुरक्षेची!

 

आजीच्या हाताला चव फार,

दुधात साखर असे आजी!

 

आजी म्हणजे फक्त नाव नसतं

वर्तमानाला भूत आणि भविष्याशी जोडणारं एक गाव असतं.

आजची आजी त्या मानाने अधिक आधुनिक आणि आपले आरोग्य उत्तम राखणारी आहे पण तिच्या मनातील नातवंडांबद्दलचे प्रेम आणि सगळ्यांबद्दलची माया कायमच असते!

 ‘नात्यांचं महावस्त्र’ विणताना आईची ‘मायेची पैठणी’ आणि बाबांची ‘सह्याद्रीची ढाल’ आपण पाहिली. पण या वस्त्राला पिढ्यान्पिढ्या चालत आलेल्या संस्कृतीची, परंपरेची आणि बिनशर्त प्रेमाची जरतारी किनार देणारं एक अथांग नातं म्हणजेच ‘आजी’! आजी म्हणजे मूर्तिमंत माया आणि प्रेम! अनुभव आणि ज्ञान, प्रेम आणि शिस्त, अध्यात्म आणि व्यवहार या सगळ्या गुणांची अनोखी सांगड म्हणजे आजी.

खरं तर, आज्यासुद्धा दोन असतात—एक वडिलांची आई आणि दुसरी आईची आई (आजोळची आजी). या दोन्ही आज्यांची नावं जरी वेगवेगळी असली, तरी दोन्हीकडे मिळणारी मायेची ऊब मात्र एकच असते. एक आजी घरात राहून आपल्यावर रोज संस्कारांचे सिंचन करते, तर दुसरी आजोळची आजी सुट्ट्यांमध्ये लाड पुरवून बालपणात आनंदाचे रंग भरते. या दोन्ही आज्यांच्या छायेत वाढणारं मूल आयुष्याच्या बाजारात कधीच अपयशी ठरत नाही. खरं तर नातवंडांना दुधावरची साय म्हटलं जातं, पण अंगावर सुरकुत्या पडलेल्या आजीची माया या दुधावरच्या सायीसारखीच घट्ट आणि समृद्ध असते!

मला माझी आजी आठवते. तिच्याबद्दल या ठिकाणी थोडं सांगणं नक्कीच अनुचित होणार नाही. माझं बालपण एका अगदी छोट्याशा खेडेगावात गेलं. मी साधारण चौथीच्या वर्गात असेपर्यंत माझी आजी आमच्यासोबत होती; त्यामुळे मला ती अगदी स्पष्ट आठवते. आजी फारशी शिकलेली नव्हती, पण तिच्याजवळ पारंपरिक आणि अनुभवजन्य ज्ञानाचे अथांग भांडार होते. ती अतिशय प्रगत विचारांची होती, नवीन चांगल्या गोष्टींना तिचा कधीच विरोध नसायचा.

मी बाहेरून खेळून आलो की आजी मला आधी सक्तीने हातपाय धुवायला लावायची; त्याशिवाय पाणी पिण्यासाठी माठाकडे जाऊ देत नसायची. मला तर खेळून आल्यामुळे तीव्रतेने तहान लागलेली असायची, त्यामुळे त्यावेळी मला कधी कधी तिचा खूप राग यायचा. पण आज मोठं झाल्यावर, जगाचा अनुभव आल्यावर कळतं की तिचं ते सांगणं आरोग्याच्या दृष्टीने किती बरोबर होतं! कोरोनाच्या भीषण काळात तर आपण सर्वजण याच गोष्टीबाबत अगदी दक्ष राहायला लागलो होतो, जी शिस्त आजीने आपल्याला बालपणीच लावली होती.

लहनपणी आम्हाला ‘आजीचे घड्याळ’ या नावाची एक सुंदर कविता होती. माझी आजी अगदी तशीच होती! तिच्याजवळ घड्याळ नव्हतं, पण तिच्या सगळ्या गोष्टी अगदी वेळच्या वेळी व्हायच्या. सकाळी पहाटे लवकर उठून धार्मिक वाचन, जप या गोष्टी ती नित्यनेमाने करायची. संध्याकाळी मला देवाजवळ हक्काने बसवून ‘शुभंकरोती’ म्हणायला लावायची आणि देवादिकांच्या रंजक गोष्टी सांगायची. आजी म्हणजे संस्कारांची एक चालतीबोलती पाठशाळाच होती.

पूर्वीच्या काळी लग्न फार लवकर होत असत. माझी आई सांगते की, तिचं लग्न माझ्या मामांनी ती अवघ्या १४-१५ वर्षांची असतानाच करून दिलं होतं. तिचे आई-वडील ती लहान असतानाच वारले होते, त्यामुळे मामांनीच तिला मायेने वाढवलं. खरं तर तिचं ते वय शाळेत जाण्याचं आणि बागडण्याचं होतं; पण परिस्थितीमुळे तिला फार शिक्षण घेता आलं नाही. लग्न होऊन नवीन घरात आल्यावर तिला स्वयंपाक वगैरे गोष्टी फारशा येत नव्हत्या. पण माझी आजी, जी नात्याने तिची सासू होती, ती तिची खऱ्या अर्थाने ‘आई’ झाली! तिने माझ्या आईला अगदी पोटच्या मुलीसारखं मानून स्वयंपाकापासून प्रपंचातल्या सगळ्या गोष्टी मायेने शिकवल्या. सासू-सुनेच्या नात्याला आई-मुलीचं रूप देणाऱ्या माझ्या अशा आजीचा मला खरोखरच सार्थ अभिमान वाटतो.

आई-बाबांचे जग हे सहसा शिस्तीचं, कर्तव्याचं आणि आजच्या काळात खरं तर खूप धावपळीचं असतं. अशा वेळी घरात आजी असणे म्हणजे दुधात साखर पडण्यासारखे आहे. आई-बाबा घरात नसले, तरी पाठीशी आजी असल्यामुळे त्यांना मुलांची अजिबात चिंता नसते. आई-बाबांच्या शिस्तीचा आणि ओरड्याचा उन्हाळा जेव्हा मुलांच्या वाटेला येतो, तेव्हा आजीच्या पदराची सावली हिमालयासारखी शीतल आणि उबदार ठरते. आईने रागवून हात उगारला की मुलं रडत जिथे जाऊन लपतात, ते जगातील सर्वात हक्काचं आणि सुरक्षित ठिकाण म्हणजे आजीची कुस!

आजीचे ते पिकलेले पांढरे शुभ्र केस हे केवळ वयाचे लक्षण नसते, तर त्यांनी आयुष्यात पाहिलेल्या शेकडो उन्हाळ्या-पावसाळ्यांच्या समृद्ध अनुभवाचे ते संचित असते. म्हणूनच, जेव्हा घरावर किंवा प्रपंचावर एखादे संकट येते, तेव्हा आजीचा हा प्रदीर्घ अनुभव घरातील माणसांना संकटातून बाहेर पडण्यासाठी योग्य दिशा दाखवतो. आजीचा तो जुना लाकडी बटवा आजही अनेकांना आठवत असेल. त्यात केवळ खोबरेल तेल, सुंठ, वेखंड किंवा लवंग नसायची; तर बालपणातल्या प्रत्येक लहान-सहान आजारपणावर फुंकर घालणारा ‘मायेचा परिसस्पर्श’ असायचा. आजच्या ‘अलोपॅथी’च्या काळातही आजीच्या बटव्यातल्या काढ्याची जी चव आणि गुण होता, तो कोणत्याही महागड्या औषधात मिळू शकत नाही. आजकालच्या बऱ्याच नवीन लग्न झालेल्या आणि नुकत्याच माता बनलेल्या आधुनिक स्त्रियांना त्यांचं मूल रडू लागलं की त्या घाबरून जातात, अशा वेळी काय करावं हे त्यांना सुचत नाही. पण घरात जर सासूबाईंच्या रूपाने आजी हजर असेल, तर आजीकडे अशा प्रत्येक प्रसंगाचे हमखास आणि शांत करणारे उत्तर तयार असते.

आजी आणि नातवंडं यांच्यातलं सर्वात मोठं आणि सोनेरी माध्यम म्हणजे ‘गोष्टी’! आजीची ती जुनी पोतडी नेहमीच अद्भूत गोष्टींनी समृद्ध असायची. रात्रीच्या वेळी आजीच्या कुशीत शिरून चांदोबाच्या गोष्टी, परिकथा, इसापनीती किंवा रामायण-महाभारतातील पराक्रमाच्या कथा ऐकणे हा बालपणीचा सर्वात सुंदर महोत्सव असायचा. त्या गोष्टींमध्ये जो निखळ आनंद होता, तो आजच्या दूरचित्रवाणीवरील ‘कार्टून्स’मध्ये नक्कीच नाही. आजी केवळ गोष्टी सांगत नसायची, तर त्या गोष्टींच्या रंजक माध्यमातून ती मुलांच्या नकळत त्यांच्या कोऱ्या मनावर ‘नैतिकतेची’ आणि ‘संस्कारांची’ पेरणी करत असायची. तिने लावलेली ‘शुभंकरोती’ची आणि रामरक्षेची सवय मुलांच्या आयुष्याला अंतर्गत शुद्धता देऊन जाते आणि आयुष्यभर हे संस्काराचे देणे माणसाला सुखद जगण्यासाठी उपयोगी पडते.

पण कधी कधी मनात अशी शंका येते की, आपण भौतिक सोयी-सुविधा मिळवून खरंच प्रगती करत आहोत का? कारण आजी-आजोबांसारखे मायेचे वटवृक्ष आज घराघरातून नाहीसे होताना दिसत आहेत. आज एकविसाव्या शतकाच्या उत्तरार्धात, बदलत्या कौटुंबिक चौकटीमुळे हे चित्र तर खूपच बदलले आहे. एकत्र कुटुंब पद्धती जाऊन ‘विभक्त कुटुंबे’ आली आणि शहरीकरणाच्या फ्लॅट संस्कृतीमध्ये आजची लहान मुले आजीच्या या अथांग मायेला मुकत चालली आहेत.

आई-बाबा दोघेही नोकरीवर गेल्यावर मुले पाळणाघरात किंवा मोबाईलच्या स्क्रीनमध्ये डोके खुपसून बसलेली दिसतात. मोबाईलवरील ‘यूट्यूब’च्या स्क्रीनवर निर्जीव आवाजात गोष्टी ऐकणे आणि आजीच्या उबदार कुशीत तिच्या हृदयाची जिवंत धडधड ऐकत गोष्ट ऐकणे, यातील जमीन-अस्मानाचा फरक आजच्या डिजिटल पिढीला समजणार कसा?

आजच्या काळाची ही मोठी शोकांतिका आहे की, ज्या आजीच्या पंखांखाली संपूर्ण घर सुरक्षित राहायचे, ती आजी आज अनेक ठिकाणी वृद्धापकाळात एकाकी पडलेली दिसते. आयुष्याच्या या संध्याकाळी तिला पैशांपेक्षा आपल्या मुलांच्या आणि नातवंडांच्या दोन गोड शब्दांची, त्यांच्या वेळेची भूक असते. ज्याप्रमाणे वाळलेल्या पानांनी कधीकाळी आपल्याला रखरखत्या उन्हात मायेची सावली दिली होती, तसेच आजीच्या पिकलेल्या केसांचा आणि तिच्या सुकून गेलेल्या हातांचा आदरयुक्त सन्मान करणे ही आपली सर्वांची नैतिक जबाबदारी आहे.

नात्यांच्या या भरजरी ‘महावस्त्रा’चा हा आजी नावाचा पदर आपल्या संस्कृतीचे खरे वैभव आहे. ही आपली ठेवणीतली पैठणी आहे. ही मायेची सावली घरात जपणे आणि तिच्या अनुभवाचे गाठोडे पुढच्या पिढीकडे आदराने सुपूर्द करणे, हीच खऱ्या अर्थाने या महावस्त्राची वीण घट्ट करणे आहे. संस्कृती, संस्कार आणि प्रेम जपायचं असेल आणि ते पुढील पिढीकडे सुरक्षित सुपूर्द करायचं असेल, तर ‘आजी’ ही गोष्ट कुटुंबातून कधीही ‘माजी’ होता कामा नये! ही तुमची, आमची आणि या समाजाची संयुक्त जबाबदारी आहे.

© श्री विश्वास देशपांडे

चाळीसगाव

प्रतिक्रियेसाठी ९४०३७४९९३२

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares
1

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ “स्वयम्…” ☆ मोहिनी किंहिकर हेडावू ☆

मोहिनी किंहिकर हेडावू

??

☆ “स्वयम्…☆ मोहिनी किंहिकर हेडावू 

असते क्षितिजावर नजर..

पण मातीत पाय घट्ट रोवलेले…

स्वतःचा शोधता शोधता अवकाश…

जपत असते नाती हळूवार सावकाश..

मनात खोलवर जाणवत की आपल्यालाही जपावं… हळूवार पणे.. अलवार..

 

जगाच्या व्यवहारात गाडून घ्यायचे नाही…!

 

आणि मनातले अंकुरणे सोडायचे नाही…!

वाटतं दिमाखात.. डौलाव…

आत्मविश्वासाने…!

 

प्रेयस.. श्रेयस… निती.. अनिती…

च्या संघर्षापेक्षा…

मनातले संघर्ष कोलाहल जास्त करतात…

ते शांतपणे हाताळावे लागतात…

 

काही खोलवर गाडून जगावे..

आशेवर! इच्छेवर!! प्रार्थनेवर!!!

© मोहिनी किंहिकर हेडावू

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares