मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ विषप्रयोग… लेखक : सुरेश नाईक ☆ प्रस्तुती : उषा नाईक ☆

उषा नाईक

📖 वाचताना वेचलेले 📖

☆ विषप्रयोग… लेखक : सुरेश नाईक ☆ प्रस्तुती : उषा नाईक ☆

Wish You..

– GoodMorning

– GoodAfternoon

– GoodEvening

– Happy Birthday

– Happy Anniversary

– Happy Journey

– Happy Stay

यासारखे विष-प्रयोग सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत आपले अनेक नातेवाईक, इष्ट मित्र-मैत्रिणी, सहाध्यायी, बरोबर काम करणारी मंडळी व्हॉट्सॲपवर करीत असतात व त्यांना. उत्तर म्हणून आपणही असेच प्रति-विषप्रयोग त्यांच्यावर करीत असतो..

हा सगळा विषप्रयोग आपल्या मंडळींनी पाश्चिमात्यांकडून उचलला आहे. बऱ्याच पाश्चिमात्य देशात हवामान अत्यंत लहरी असते. एका दिवसात अनेकदा ऊन-पाऊस, गोठवणारी थंडी, घोंघावता वारा या सर्वांचा प्रसाद मिळू शकतो.. त्यातूनच सकाळी-सकाळी आपल्या आप्तेष्टांना आजची सकाळ, आजचा दिवस आपल्याला सुखकारक जावो अशा शुभकामना देण्याचा प्रघात पडला. आपल्या देशातील हवामान दिवसात फारसे बदलत नसते. त्यामुळे अशा शुभकामना देणे यथोचित वाटत नाही.

वैश्विक मायाजाळातून फारशी तोशीस न घेता शोधून फुले, फुलांचे ताटवे यांचे रतीब घालणारे या विष-प्रयोगाबरोबरच कळत-नकळत अनेक वेळा त्या सोबत व्हायरस पाठवत असतात. मुख्य म्हणजे त्यामुळे फोनमधील बरीच मेमरी व डाटा खर्ची पडतो.. – परत हे सगळे कोमेजलेले फुलांचे ताटवे मेमरीमधून काढून टाकण्याची कसरतसुध्दा करावी लागते..

कळत-नकळत असे विषप्रयोग करणाऱ्या मंडळींचे, त्यांनी न मागता केलेले हे प्रबोधन!

लेखक – सुरेश नाईक

प्रस्तुती :  उषा नाईक

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ प्रवाह आणि लाटा! ☆ प्रतिमा रवींद्र कुलकर्णी  ☆

प्रतिमा रवींद्र कुलकर्णी

अल्पपरिचय 

प्रतिमा रवींद्र कुलकर्णी .

शिक्षण – B Com,  B J, M Phil ( मराठी साहित्य )

  • १९९८ पासून आकाशवाणीवरून  विविध कार्यक्रमांचे लेखन व सादरीकरण
  • गेल्या वीस वर्षांपासून सातत्याने दिवाळी अंकासाठी कथा, कविता व नियतकालिकांमधून सदरलेखन  प्रसिद्ध

प्रकाशित साहित्य : (४ पुस्तके)

  • स्वप्नझुला (कवितासंग्रह)
  • कविता उलगडताना (आस्वादक समिक्षा संग्रह)
  • सोनबावरी (ललितलेख संग्रह) व
  • रुजवाई (कथासंग्रह )

? विविधा ?

☆ प्रवाह आणि लाटा! प्रतिमा रवींद्र कुलकर्णी 

‘काय करु, ताई ? कालपासून गिऱ्हाईकच नाही. ’ फळवाला नाराजीने म्हणाला.  गिऱ्हाईक या शब्दाचे मूळ काय बरं असेल ? मी विचारात पडले आणि मला संस्कृतमधला ग्राहक हा शब्द आठवला आणि मग याच्यासारखेच कितीतरी शब्द आठवले.  संस्कृतमधल्या मिष्ट म्हणजे गोड चे मराठीत गोडमिट्ट झाले.  मुष्टीचे मुठीत रूपांतर झाले.  पत्रल चे पातळ झाले आणि ‘शाटी’चे साडी झाले.  संस्कृतमधून मराठीत येताना शब्दांचे रूपरंग बदलते.  अभिजनांच्या भाषेतून आलेल्या मूळ शब्दाला लोकभाषेचा मुलामा चढतो.  पण अशा बदललेल्या शब्दांना बोलीभाषेत अपभ्रष्ट शब्द म्हटले जाते.  भ्रष्ट होणे म्हणजे खाली पडणे किंवा घसरणे.  भ्रंश म्हणजे विकृत होणे किंवा बिघडणे.  त्यामुळे मूळ संस्कृत शब्दाच्या बिघडलेल्या रुपाच्या शब्दाला अपभ्रंशाने आलेला शब्द असे म्हटले जाते.  असे कितीतरी शब्द आता आपल्या भाषेत रुळून गेलेले आहेत कि त्याचे मूळ रुप आठवावे लागते.  आपल्या बोलीभाषेतल्या या शब्दांत आपल्या मातीचा गंध जाणवतो.  उदा.  ग्रामीण भागात उशीर या अर्थी वाढूळ (किंवा वाढवेळ) हा शब्द सहजतेने वापरला जातो.  त्याचे मूळ संस्कृतातल्या ‘वृध्दवेला ‘ (म्हणजे वाढलेला (वाढीव ) वेळ ) या शब्दात आहे.  काळाच्या प्रवाहात शब्दांची ही बदलत गेलेली रूपे !

अपभ्रंश ही संज्ञा केवळ शब्दांसंदर्भात वापरली जाते असे नाही, तर ते विशिष्ट काळातल्या भाषेचे नाव होते.  संस्कृत भाषेतून प्राकृत आणि त्यातून आधुनिक भाषा परिणत होत असतानाचा एक टप्पा म्हणजे अपभ्रंश भाषा.  साधारणतः सहाव्या शतकापासून अकराव्या शतकापर्यंत ती बोलली जात असे.  विशेषतः पाली, मागधी, महाराष्ट्री या प्राकृत भाषांच्या या काळातल्या रूपांना अपभ्रंश भाषा म्हटले जाते.  सिद्ध, जैन, बौद्ध अशा धर्मोपदेशकांनी जनसामान्यांची बोली अनुसरत आपले कार्य केले.  पुढे परिणत होऊन आधुनिक बंगाली, गुजराती, मराठी यासारख्या विकसित भाषांचा जन्म झाला.  संस्कृतमधून आलेले मूळ शब्द अपभ्रंश प्राकृतच्या संगतीने मराठीत परिणत झाले.  संस्कृतमधून प्राकृत आणि त्यांचे मराठीकरण झालेल्या शब्दांची काही उदाहरणे – अग्रतः – अग्गदो – आघाडी.  सत्यम् – सच्छम – साच.  मयूर – मोरो – मोर.  ही रुपे पाहताना प्राकृत -अपभ्रंश भाषेची आपल्या आजच्या मराठीशी जवळीक लक्षात येते.

भाषेतली ही स्थित्यंतरे त्यांच्या लिखित नमुन्यांमधून जाणवतात.  प्रत्येक काळानुरूप तिच्यात झालेले वैशिष्टपूर्ण बदल जाणवतात.  मंगळवेढयाच्या ताम्रपटातली( इ. स.  ४८८ – शके ४१०) शके ६५८ मधील चिकुर्डे ताम्रपटातली आणि शके १०५१ च्या चालुक्यराज सोमेश्वर रचित अभिलषितार्थ चिंतामणी या ग्रंथातली भाषाशैली वेगळी जाणवते.  शके १११० च्या विवेकसिंधू (मुकुंदराज ) मध्ये ‘ जैसे अमृत चाखे आपुले चवी । तैसे स्वसुख अनुभवी ” असे अध्यात्मज्ञान येते.  

शके ११२८ मधल्या पाटणच्या शिलालेखात ‘कापासी दामाचा विसोवा, आसुपाठी मगरे दिन्हला ‘ आसू म्हणजे त्यावेळचे चलन व कापूसविक्रीसंदर्भात हे लेखन असावे.  बारा-तेराव्या शतकातल्या महानुभाव ग्रंथात – आबैसी गोसावियाते पुसिले ( आबाईसा नावाच्या शिष्येने चक्रधरांना विचारले ) अशी भाषा येते.  याच काळातल्या ज्ञानेश्वरीप्रमाणेच उकारांत वळणाची भाषा तेराव्या शतकातल्या पंचतंत्र (मराठी ) मध्ये ‘पिंगलकु पुसे, दमनकु सांघे ‘ पहायला मिळते.  यानंतरच्या काळातल्या रामदास, तुकाराम, एकनाथ अशा संतांच्या मांदियाळीने विपुल लेखन केले त्यातून त्या त्या काळातील समाजभाषेचे दर्शन घडते.  बखरवाङमयातून, ऐतिहासिक पत्रव्यवहारातून वापरलेल्या भाषेतून अरबी, फारसीचा प्रभाव जाणवतो.  पेशवाई काळापासून मोरोपंत, महीपती, वामनपंडित यांच्या काव्यातून संस्कृतप्रचुरता आढळते.  त्यानंतरच्या काळात इंग्रजांच्या प्रभावामुळे इंग्रजी शब्दांचा वापर वाढत गेला.

भाषेची ही प्रत्येक शतकांत बदललेली रूपे म्हणजे बदलत गेलेल्या समाजाचे प्रतिबिंब ! संस्कृतीचे बदलत गेलेले रूप भाषेच्या इतिहासातून उलगडत जाते.  त्या काळातले लेखन आणि शब्दसंपत्तीवरून अनेक गोष्टींचा अंदाज येतो.  समाज, संस्कृती आणि भाषा यांच्यावर इतरांचा प्रभाव पडणे हे अपरिहार्य असते.  त्यामुळे प्रारंभापासून अखेरपर्यंत तिचे स्वरूप एकसारखे राहत नाही.  नव्या कल्पनांसोबत नव्या शब्दांची भर पडत जाते.  कधी जुन्या शब्दांचे नवे अर्थ रूढ होतात तर कधी कल्पना कालबाह्य झाल्यामुळे शब्दही नाहीसे होतात.  शब्दांच्या या भरती आणि ओहोटीमुळे भाषेच्या प्रवाहात लाटांचे उसळणे अपरिहार्य ठरते.

 

© प्रतिमा रवींद्र कुलकर्णी

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ “येई वो विठ्ठले…” ☆ नीता चंद्रकांत कुलकर्णी ☆

नीता कुलकर्णी

? मनमंजुषेतून ?

☆ “येई वो विठ्ठले…” ☆ नीता चंद्रकांत कुलकर्णी

“येई वो विठ्ठले माझे माऊली ये

निढळावरती कर ठेवुनी वाट मी पाहे… “

आलीया गेलिया हाती धाडी निरोप

पंढरपुरी आहे माझा मायबाप”

विठ्ठलाची ही आरती मला फार आवडते.

येई वो… किती प्रेमाने, लडिवाळपणे,आपलेपणाने विठु माऊलीला साद घातलेली आहे. अरे ये रे…

लांबवर कोणी दिसतंय का हे बघायला आपण कपाळावर (निढळावर)आडवा हात धरतो.

डोळे बारीक करून कोणी दिसतंय का… हे आतुरतेने बघायला लागतो. तशीच आम्ही तुझी वाट बघतोय.. तू येरे…

आमचा प्रतिपाळ करणारा तो माय आणि बाप दोन्ही आहे. येणाऱ्या जाणाऱ्यां बरोबर त्याला निरोप दिलेला आहे… त्यामुळे त्याच्या वाटेकडे डोळे लाऊन बसलो आहोत… तो येणार ही मनाशी खात्री आहे… त्याची वाट बघण्यातही आनंद आहे…

“पिवळा पितांबर कैसा गगनी झळकला

गरुडावरी बैसोनी माझा कैवारी आला… “2

अंतरंगातला प्रकाश उजळला तरच हे डोळे दिपवून टाकणार आभाळभर पसरलेलं..

झळकलेलं दिसेल.

प्रत्यक्ष विठ्ठल येणार आहे त्याचं रूप असे भव्यदिव्यच असणार…

कल्पनेच्या राज्यात जाऊन बघा बरं ते रूप…

मग गरुडावर बसून येणारा तो कैवारी दिसेल… पण तो माझा कैवार म्हणजे पक्ष कधी आणि कसा घेईल… याचाही मला विचार करायला हवा. त्यासाठी माझी बाजू सत्याची,न्यायाची हवी. मगच तो माझ्या साथीला येईल.

“असो नसो भाव आम्हा तुझिया ठाया

कृपादृष्टी पाहे माझ्या पंढरीराया”3

महाराजांना आपली स्थिती कशी आहे हे पूर्ण माहित आहे… ते ओळखून आहेत.. तुझ्या बाबतीत आमचा भाव इतका शुद्ध,सात्विक, निरामय नाही. आम्ही प्रपंचात अडकलो आहोत.. तुझ्याकडे काहीतरी मागायलाच येतो. संकटात असलो की तुझी आठवण काढतो..

स्वतःचे हे अवगुण माहीत असूनही अत्यंत लडिवाळपणे हक्काने ते सांगत आहेत…

कारण तो सर्वांत जवळचा आहे. इथे त्याला म्हणूनच

“माझ्या पंढरीराया” असे संबोधले आहे.

तू आम्हाला क्षमा कर आणि आमच्याकडे कृपाळु नजरेने पहा.

“विठोबाचे राज्य आम्हा नित्य दिपवाळी

विष्णुदास नामा जीवे भावे ओवाळी”4

विठ्ठलाचा आशीर्वाद मिळाला की मग काय रोजच दिवाळी… दिवाळी म्हणजे पूर्णानंद आणि तो रोजच मिळणार… मग सुखाला काय कमी?

म्हणूनच आपला सात्विक भाव एकत्र करून त्याची आरती करायची.. आरती म्हणजे काय तर… आर्त स्वराने हृदयातून साद घालून म्हटली जाते ती आरती…

आता अंतकरणात भक्तीची निरांजन पेटवायची.. सदविवेकाचा कापूर लावायचा.. मनोभावे… आरती करायची.. तरच ती विठ्ठलापर्यंत पोहोचेल. इतका मनोरम आणि निर्मळ भाव आमच्यात हवा.. आरती म्हणताना ती आस आमच्या शब्दातही हवी…

असं हे या आरतीतलं आपल्याला नीट समजलेलं आहे.

इथपर्यंत झालं…

आता आपल्याला कृती करायची आहे. शांतपणे डोळे मिटून घ्यायचे. आरती नुसती तोंडाने म्हणायची नाही तर ती अंतःकरणपूर्वक म्हणायची. त्यातला मूळ अर्थ जाणून घ्यायचा. शाब्दिक अर्थापेक्षा खूप वेगळे काही सांगायचं आहे हे ध्यानात… लक्षात घ्यायचं आहे.

मग जबाबदारी वाढते. आपल्याला तसं वागायचं बंधन येतं. पण हे बंधन हवसं आहे. या बंधनात कोणाची जबरदस्ती नाही. तर विठ्ठल प्रेमाने आपणच… बांधून घ्यायच आहे.

आपल्याला प्रगत करणारं उन्नतीकडे नेणार अस हे आहे. ते पूर्णपणे अंगी बाणून घेऊया.

विठ्ठलाला अनन्य शरण जाऊ या

मग तो येईलचं त्याची वाट पाहूया…

प्रत्यक्ष विष्णुदास नामांनीच हे सांगितलेलं आहे ते सुद्धा कितीतरी वर्षापूर्वी… एक सांगू का…

आपणही मनापासून बोलावून तर बघू या … मग प्रेमाने त्याला हाक घाला बरं ……

येई वो विठ्ठले माझे माऊली ये ……  

©  नीता चंद्रकांत कुलकर्णी

मो 9763631255

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ मनाचे श्लोक – एक सार्वकालिक ‘मनोपनिषद’… – श्लोक ८१ आणि ८२ ☆ श्री विश्वास देशपांडे ☆

श्री विश्वास देशपांडे

? इंद्रधनुष्य ?

☆ मनाचे श्लोक – एक सार्वकालिक ‘मनोपनिषद’… – श्लोक ८१ आणि ८२ ☆ श्री विश्वास देशपांडे ☆

श्लोक क्र. ८१ – – 

मना मच्छरे नाम सांडू नको हो ।

अती आदरे हा निजध्यास राहो ।

समस्तांमधे नाम हे सार आहे ।

दुजी तूळणा तूळिता ही न साहे ।।८१।।

अर्थ : हे मना, कोणत्याही प्रकारच्या मत्सराच्या आहारी जाऊन देवाचे नामस्मरण कधीही सोडू नकोस. इतरांचा हेवा करण्यात वेळ वाया घालवण्याऐवजी, अत्यंत आदराने व निष्ठेने भगवंताच्या नामाचा अखंड ध्यास घे. देवाचे नामस्मरण हेच सर्व श्रेष्ठ साधन आहे. त्याची तुलना अन्य कशाशीही करवत नाही.

(मच्छरे – मत्सराने, सांडू नको – सोडू नको, निजध्यास – मनाला ध्यास/ओढा लागणे, समस्तांमधे – ईश्वरप्राप्तीच्या सर्व साधनांमध्ये, दुजी – दुसरी, तूळिता – तुलना करता)

विवेचन : या श्लोकातही समर्थ नामाचा महिमा आपल्याला सांगतात. आधीच्या श्लोकात निर्धारपूर्वक ज्या मत्सराचा त्याग करायला समर्थांनी आपल्याला सांगितले, त्याचा उल्लेख या ठिकाणी पुन्हा येतो. मानवी स्वभाव असा आहे की जी गोष्ट आपल्याकडे नाही पण दुसऱ्याकडे आहे असे पाहिल्यावर त्या व्यक्तीबद्दल पहिली प्रतिक्रिया मनात येते ती म्हणजे मत्सर. हा मत्सर वाढत गेला की अनर्थ घडतो. नको त्या गोष्टी माणसाच्या हातून घडतात. गीतेत सांगितल्याप्रमाणे ‘ मत्सर ‘ हा आसुरी गुण आहे. मागील काही श्लोकात हिरण्यकश्यपूचे उदाहरण आपण पाहिले आहे. हिरण्यकश्यपू राजा होता, सामर्थ्यवान होता, स्वतःच्या शक्तीचा त्याला गर्व होता, इथपर्यंत सर्व ठीक आहे. पण जेव्हा लोक त्याची स्तुती करायची सोडून परमेश्वराची स्तुती करतात, तेव्हा मात्र त्याच्या मनात भगवंताच्या नामाविषयी मत्सर निर्माण होतो. मग प्रजेने आपलेच नाम घ्यावे, भगवंताचे नाम कोणी घेऊ नये असा आदेश तो काढतो. पण त्याचा स्वतःचा मुलगाच विष्णुभक्त असतो. शेवटी मत्सर आणि द्वेषामुळे हिरण्यकश्यपूचा नाश होतो हे आपल्याला माहिती आहे.

काही लोकांना नकळत नामाबद्दलही द्वेष असतो. नामाने असे काय होणार आहे? त्याला कशाला एवढे महत्व द्यायचे? मग नकळत नामाबद्दल मनात मत्सर निर्माण होतो. नाम घ्यायला सुरुवात केली असेल तरी मग असा मनुष्य नाम घेणे सोडून देतो. म्हणून समर्थ म्हणतात की बाबारे, मत्सराच्या अधीन होऊन नाम घेणे सोडू नकोस.

मत्सराच्या अधीन झालेल्या माणसाला नामाचे महत्वच कळलेले नसते. महत्व कळण्यासाठी नामाचे सामर्थ्य माहित असावे लागते. त्यासाठी संतांचा उपदेश मनापासून ऐकावा लागतो. तो उपदेश नुसता ऐकून चालत नाही तर तो पटला पाहिजे. इथे बळजबरी उपयोगाची नसते. हे महती जेव्हा पटते, तेव्हा भगवंताबद्दल, नामाबद्दल आदर निर्माण होतो. म्हणून भगवंताचे नाम आदरपूर्वक घेतले पाहिजे. त्यात प्रेम हवे. आणखी महत्वाची गोष्ट म्हणजे त्याचा ध्यास लागला पाहिजे. आपल्या आवडीची एखादी गोष्ट असते. मग तिचा आपल्याला ध्यास म्हणजेच छंद लागतो. हा छंद लागला म्हणजे मन पुन्हापुन्हा तिकडे ओढ घेते. कोणी सांगावे लागत नाही. तुकाराम महाराज म्हणतात, ” गोविंद गोविंद, मना लागलिया छंद. ” एखाद्या विद्यार्थ्याला अभ्यासाची आवड निर्माण झाली की त्याला कोणी अभ्यास कर म्हणून सांगावे लागत नाही. साधकाला नामाची गोडी लागली की मग नाम घ्या असे त्याला सांगावे लागत नाही.

परमेश्वर प्राप्तीची अनेक साधने आहेत. अनेक मार्ग आहेत. पण त्या सर्वांमध्ये ‘ नाम ‘ हे साधन श्रेष्ठ आहे. त्यासाठी कोणतीही उपाधी, कोणतेही साधन लागत नाही. जपमाळ नसली तरी चालते. आपले काम करताना देखील नाम जपता येते. ‘ हरी मुखे म्हणा, हरी मुखे म्हणा । पुण्याची गणना कोण करी ।। असे ज्ञानेश्वर माउली म्हणतात. त्याचे तात्पर्य हेच आहे. ते नाम सोपे रे रामकृष्ण गोविंद असे ते सांगतात ते याचसाठी. समर्थही आपल्याला हीच गोष्ट सांगतात. संतांच्या उपदेशात एकवाक्यता असते. लोककल्याणाची तळमळ आढळते. शब्द भलेही वेगळे असतील पण तात्पर्य एकच असते.

तेव्हा हे मना, कोणत्याही परिस्थितीत तू नाम घेणे सोडू नकोस. ते अत्यंत आदरपूर्वक घे. समस्त साधनांमध्ये ते सारभूत आहे. त्याची महती एवढी की त्याची तुलना अन्य कशाशीही होऊ नाही. ‘ नामपरते तत्व नाही रे अन्यथा. ‘ हे लक्षात ठेव.

स्वसंवाद : 

१. माझ्याकडे जे नाही आणि इतरांकडे आहे, ते पाहून माझ्या मनात नकळत ‘मत्सर’ किंवा हेवा निर्माण होतो का? त्यामुळे माझे मनस्वास्थ्य हरवते का?

२. संतांनी सांगितल्याप्रमाणे, माझ्या मनाला संसार किंवा इतर भौतिक गोष्टींऐवजी कधी भगवंताच्या नामाचा ‘निजध्यास’ (छंद) लागला आहे का?

३. नाम घेताना भगवंताबद्दल आदर आणि प्रेम माझ्या मनात असते का?

४. माउलींनी सांगितल्याप्रमाणे “नामापरते तत्त्व नाही रे अन्यथा” यावर माझा पूर्ण विश्वास बसला आहे का? की माझे मन अजूनही इतर साधनांच्या गराड्यात फिरत असते?

===== 

श्लोक क्र. ८२ – – 

बहू नाम या रामनामी तुळेना ।

अभाग्या नरा पामरा हे कळेना ।

विषा औषध घेतले पार्वतीशे ।

जिवा मानवा किंकरा कोण पूसे? ।।८२।।

अर्थ : रामनामाची तुलना अन्य कोणत्याही नामाशी होऊ शकत नाही. परंतु जी माणसे पारमार्थिक दृष्ट्या अभागी असतात, त्यांना (रामनामाचे हे महत्व) कळत नाही. अहो, प्रत्यक्ष भगवान शंकरांनी विषाचा दाह शांत करण्यासाठी रामनाम हे औषध म्हणून घेतले. मग आपल्यासारख्या सामान्य जीवांची त्यासमोर किंमत काय?

(तुळेना – तुलना होऊ शकत नाही, अभागी नर – पारमार्थिक दृष्टया दुर्दैवी व्यक्ती, पार्वतीशे – भगवान शंकर/ पार्वतीचे पती, किंकर – चाकर/दास)

विवेचन : या श्लोकामध्ये देखील अन्य श्लोकांप्रमाणे समर्थ रामनामाचे महत्व आपल्या मनावर ठसवत आहेत. श्रीराम हे समर्थांचे आराध्य दैवत. त्यामुळे साहजिकच त्यांना रामनामापुढे अन्य नामाचे महत्व वाटत नाही. रामनामाची तुलना अन्य कशाशीही होऊ शकत नाही असे त्यांना वाटते. आणि त्यांना असे वाटणे हे अगदी बरोबर आहे. रामरक्षेचा समारोप करताना बुधकौशिक ऋषींनी रामनामाचे महत्व सांगताना, ” सहस्रनाम तत्तुल्यं रामनाम वरानने ” असे म्हणतात. अर्थात या श्लोकात भगवान शंकर पार्वतीला रामनामाचे महत्व सांगताना म्हणतात की राम राम या नामातच माझा जीव रमतो. रामनाम हे विष्णूच्या सहस्त्र नामांची बरोबरी करणारे आहे. खरे तर रामनामाचे महत्व स्पस्ट करणारे एवढे मोठे उदाहरण दिल्यानंतर अन्य काही सांगण्याची आवश्यकताच राहत नाही. पण तरीदेखील माता जशी तळमळीने आपल्या मुलाला एखादी गोष्ट समजावून सांगते, तसेच समर्थ आपल्याला सांगत आहेत.

आपली ज्या देवतेवर श्रद्धा असेल, त्या देवतेचे नाम हे अत्यंत श्रेष्ठ आहे असे आपल्याला वाटले पाहिजे. आपण जर शंकराची भक्ती करीत असू तर ‘ ओम नमः शिवाय ‘ या मंत्रावर आपली दृढ श्रद्धा असली पाहिजे. आपण जर विष्णूचे भक्त असू तर ‘ ओम नमो भगवते वासुदेवाय ‘ या मंत्रावर आपली दृढ श्रद्धा असली पाहिजे. तसेच रामनामाचे महत्व श्रीरामाच्या भक्तांना वाटले पाहिजे. ते सांगण्यासाठीच समर्थांची एवढी तळमळ!

पण समर्थ म्हणतात,” जी माणसे पारमार्थिक दृष्टया अभागी असतात त्यांना रामनामाचे हे महत्व (सांगूनही) कळत नाही. म्हणूनही असे जीव अभागीच आहेत. मुखामध्ये रामनाम यायला किंवा त्याची गोडी वाटायला देखील काही तरी पूर्वसंचित हवे. मुखात रामनाम येणे किंवा रामनाम घ्यावेसे वाटणे हे खरोखरच भाग्याचे लक्षण आहे. ज्यांना तसे वाटत नाही ते जीव अभागी!

देवांनी आणि राक्षसांनी मिळून समुद्रमंथन केले. त्यातून दिव्य अशा चौदा रत्नांसोबतच हलाहल (जहाल विष) देखील बाहेर आले. त्यामुळे सर्व प्राणिमात्रांच्या आणि सृष्टीच्या अस्तित्वालाच धोका उत्पन्न झाला. भगवान शंकरांनी हे हलाहल प्राशन करून सर्व सृष्टी आणि प्राणिमात्रांचे रक्षण केले. पण त्यांचा अंगाचा तीव्र दाह होऊ लागला. तो कशानेच शांत होईना. त्या हलाहलाने त्यांचा कंठ निळा झाला. ते नीलकंठ म्हणून ओळखले जाऊ लागले. विषाचा दाह शांत होण्यासाठी त्यांनी शीतल चंद्र मस्तकी धारण केला. गंगेला देखील मस्तकी धारण केले. पण शेवटी रामनामानेच त्यांचा दाह शांत झाला.

जालीमातील जालीम विषाचा देखील ज्या औषधाने दाह शांत होतो, असे औषध म्हणजे रामनाम आहे. सर्व भव म्हणजे संसाराचे भय हरण करणारे, दुःख दूर करणारे असे हे औषध आहे. ज्याप्रमाणे श्रीरामाचा बाण अचूक शरसंधान करतो, तसे रामनाम म्हणजे रामबाण औषध आहे. आधुनिक विज्ञानाने देखील रामनामाचे महत्व मान्य केले आहे. आजचे मानसशास्त्र आणि न्यूरो सायन्स रामनाम हे प्रभावी साउंड थेरपी आणि ध्यान पद्धतीसाठी अत्यंत उपयुक्त असल्याचे स्पष्ट करतात. तणावमुक्तीसाठी रामनाम ऊर्जा प्रदान करणारे असल्याचे ही आधुनिक शास्त्रे मान्य करतात.

प्रत्यक्ष भगवान शंकर जेव्हा रामनामाच्या आश्रय घेतात तेव्हा आपल्यासारख्या सामान्य नराची काय कथा? संत तुलसीदासजी म्हणतात, ” रामनाम में पावत पावन, रवी तेजोमय चंद्र सुधा धन. ” रामनाम हे पावन करणारे आहे. ज्याप्रमाणे सूर्याचा तेज आणि चंद्राची शीतलता आपल्याला जीवन प्रदान करते, तसेच हे रामनाम सर्व सुख, परम शांती आणि ऊर्जा देणारे आहे.

स्वसंवाद :: 

१. ज्याप्रमाणे भगवान शंकरांनी विषाचा दाह शांत करण्यासाठी रामनामाचा आश्रय घेतला, तसा मी माझ्या आयुष्यातील राग, मत्सर किंवा चिंतेचा दाह शांत करण्यासाठी नामस्मरणाचा आधार घेतो का?

२. “मुखामध्ये रामनाम येणे किंवा त्याची गोडी वाटणे हे भाग्याचे लक्षण आहे,” हे लक्षात घेऊन मी माझ्या या परम भाग्याचा रोज सुयोग्य वापर करतो का?

३. माझ्या आराध्य दैवताच्या नामावर आणि मंत्रावर माझी संपूर्ण आणि अनन्य श्रद्धा आहे, की माझे मन अजूनही डळमळीत होत असते?

४. संत तुलसीदासांनी म्हटल्याप्रमाणे, रामनामातील सूर्याचे तेज आणि चंद्राची शीतलता अनुभवण्यासाठी मी दिवसातून काही क्षण तरी शांत चित्ताने नाम घेतो का?

– क्रमशः श्लोक श्लोक ८१ आणि ८२

© श्री विश्वास देशपांडे

चाळीसगाव

प्रतिक्रियेसाठी ९४०३७४९९३२

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ ही तर एक ‘सुवर्णकथा’… लेखक : श्री संदीप चव्हाण ☆ डॉ मकरंद पिंपुटकर ☆

डॉ मकरंद पिंपुटकर

? इंद्रधनुष्य ?

☆ ही तर एक ‘सुवर्णकथा’… लेखक : संदीप चव्हाण ☆ डॉ मकरंद पिंपुटकर 

डॉ. पांडुरंग खानखोजे

यंदाच्या फुटबॉल विश्वचषकाचा उद्घाटनीय सामना रंगला, तो मेक्सिको सिटीत. यजमान मेक्सिकोसह अमेरिका आणि कॅनडाही या स्पर्धेचे सहआयोजक आहेत. तब्बल ३२ तासांचा प्रवास करून मी अखेर या उद्घाटन सामन्याच्या वार्तांकनासाठी मेक्सिकोत पोहोचलो.

फुटबॉलची मजा काही औरच असते. मैदानावर चेंडू फिरत असताना जितका थरार असतो, त्यापेक्षाही अधिक जल्लोष सामना संपल्यानंतर स्टेडियमबाहेर उसळतो. जणू तो एक बेधुंद करणारा कार्निव्हल असतो.

सामना संपताच, मीही त्या कार्निव्हलचा भाग झालो. पोटात भूक होतीच; पण स्टेडियमबाहेर सर्वत्र लागलेल्या मक्याच्या स्टॉलने ती आणखीच भडकावली. एका स्टॉलवर मी थांबलो. उकडवलेले टपोरे मक्याचे दाणे, त्यावर खास मेक्सिकन तिखट मसाल्याचा पहिला घास घेताच, जिभेवर मेक्सिको उतरल्यासारखे वाटले. माझ्यासोबत काही स्थानिक मेक्सिकन पत्रकार होते. त्यातील एकजण सहज म्हणाला,’Did you know Pandurang Khankhoje? The man from India. This crop is his gift. ‘

क्षणभर माझा घास अडकला. डोळ्यांसमोर फुटबॉलचा जल्लोष होता, हातात मेक्सिकन मका होता आणि कानांवर आलेले नाव होते, पांडुरंग खानखोजे!

स्वातंत्र्य लढ्यात ‘गदर पार्टी’ स्थापन करणार्‍या क्रांतिकारकांपैकी एक पांडुरंग सदाशिव खानखोजे महाराष्ट्रातील वर्ध्याचे होते, इतके जुजबी ज्ञान होतेच. पण मेक्सिकोच्या फुटबॉल कार्निव्हलमध्ये, मक्याच्या त्या स्टॉलपाशी, एका मेक्सिकन पत्रकाराकडून त्यांचे नाव ऐकणे, हा माझ्यासाठी आयुष्यभर जपावा, असा क्षण होता.

मेक्सिकोच्या हरित क्रांतीत महाराष्ट्रात जन्मलेल्या या सुपुत्राचा मोलाचा वाटा होता. मेक्सिकन टाको जितके प्रसिद्ध, तितकाच येथील मका लोकांच्या जगण्याचा भाग आहे आणि त्या मक्याच्या समृद्धीमागे एका मराठी माणसाचे संशोधन, परिश्रम आणि दूरदृष्टी आहे, ही गोष्ट अंगावर रोमांच उभे करणारी आहे.

१९२० साली खानखोजे मेक्सिकोत आले आणि मग जणू मेक्सिकोचेच झाले. वयाच्या १६व्या वर्षी लोकमान्य टिळकांकडून प्रेरणा घेऊन त्यांनी घर सोडले. जपानमार्गे अमेरिका गाठली. मजूर म्हणून काम केले. त्याचबरोबर शिक्षण घेतले. वॉशिंग्टन विद्यापीठातून पदवी संपादन केली. लष्करी प्रशिक्षण घेतले. तेथेच लाला हरदयाल यांच्याशी त्यांची भेट झाली आणि ‘गदर चळवळी’चा प्रवास सुरू झाला.

क्रांतीच्या कार्यामुळे भारतात परतणे त्यांना शक्य नव्हते. अशा वेळी मेक्सिकन शेतकर्‍यांच्या ओळखीने त्यांनी मेक्सिको गाठले. तेथे राष्ट्रीय कृषी विद्यापीठात त्यांनी नोकरी स्वीकारली आणि सुरू झाला, एका मराठी क्रांतिकारकाचा दुसरा अवतार, अन्नक्रांतीचा, शेतीक्रांतीचा, माणुसकीच्या सेवेत झोकून देणार्‍या शास्त्रज्ञाचा!  

मेक्सिकोतील हवामानात मक्याच्या उत्पादनात होणारी घट त्यांना अस्वस्थ करीत होती. त्यांनी त्यावर अथक संशोधन केले. मक्याचे नवे वाण विकसित केले; ते पुढे जगभर स्वीकारले गेले. त्यांच्या संशोधनामुळे मेक्सिकोतील असंख्य शेतकर्‍यांचे जीवनमान उंचावले. एका परक्या देशात आलेल्या मराठी माणसाने तेथील मातीत स्वतःला मिसळून घेतले आणि त्या मातीतून लाखो लोकांच्या पोटाची भाकर उगवली.

मेक्सिकोनेही या ऋणाची जाण ठेवली. मेक्सिकोच्या शिक्षण सचिवालयाच्या इमारतीत खानखोजेंच्या सन्मानार्थ खास म्युरल साकारण्यात आले आहे. महान चित्रकार दिएगो रिव्हेरा यांनी ‘लास्ट सपर’च्या धर्तीवर हे म्युरल चितारले. त्यात खानखोजे मेक्सिकोच्या सामान्य शेतकर्‍यांसोबत मका आणि भाकरीची मेजवानी करताना दिसतात. हा केवळ चित्राचा सन्मान नाही; तो एका भारतीयाला, एका महाराष्ट्रीयाला, एका मराठी माणसाला मेक्सिकोने केलेले कृतज्ञ अभिवादन आहे.  

एक मराठी क्रांतिकारक विचारांनी जपान, पॅरिस, अमेरिका फिरत मेक्सिकोत येतो, तिथे स्थिरावतो आणि गरीब शेतकर्‍यांचा अन्नदूत बनतो, ही कथा छाती अभिमानाने फुलवणारी आहे. “खानखोजे माझ्या महाराष्ट्रातील आहेत,’ असे त्या मेक्सिकन पत्रकाराला सांगताना माझ्या डोळ्यांच्या कडा नकळत पाणावल्या. त्याक्षणी मला वाटले, ही मेक्सिकोवारी सार्थकी लागली.  

खानखोजे यांच्या कृषिक्षेत्रातील योगदानाची दखल घेऊन मेक्सिकोच्या ‘चॅपिंगो’ विद्यापीठात त्यांचा पुतळा उभारण्यात आला आहे. हा पुतळा केवळ दगडाचा नाही; तो मराठी कर्तृत्वाचा, भारतीय प्रतिभेचा आणि सीमांच्या पलीकडे जाणार्‍या मानवतेचा साक्षीदार आहे!

१९४७ मध्ये भारत स्वतंत्र झाल्यानंतर खानखोजे सहकुटुंब भारतात परतले. महाराष्ट्राच्या भूमीत, नागपुरात दि. २२ जानेवारी १९६७ रोजी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. सक्रिय राजकारणापासून ते शेवटपर्यंत दूर राहिले; पण त्यांनी केलेले कार्य कोणत्याही राजकीय पदापेक्षा मोठे होते. त्यांनी एका देशातील शेतकर्‍यांचे जीवन बदलले. त्यांनी भुकेशी लढणार्‍या माणसांच्या हातात आशेचा दाणा दिला.

मेक्सिकोत सुरू असलेल्या फुटबॉल विश्वचषकात भारत नाही. जागतिक क्रमवारीत भारत १३९व्या क्रमांकावर आहे. भारत फुटबॉल विश्वचषक कधी जिंकेल, हे माहीत नाही. पण १०० वर्षांपूर्वी एका मराठी माणसाने मेक्सिकोच्या मातीवर येऊन येथील लोकांची मने जिंकली, ही नोंद आचंद्रसूर्य राहील, हे नक्की!

फुटबॉलच्या जल्लोषात, मक्याच्या एका साध्या घासातून मला महाराष्ट्राची ही सुवर्णकथा भेटली. मेक्सिकोत खानखोजे आजही जिवंत आहेत, शेतकर्‍यांच्या स्मृतीत अन् मक्याच्या प्रत्येक दाण्यात! पांडुरंग खानखोजे यांची ही यशोगाथा अनुभवण्यासाठी एकदा तरी मेक्सिकोला आलेच पाहिजे.

धन्यवाद

लेखक : संदीप चव्हाण

प्रस्तुती : डॉ. मकरंद पिंपुटकर 

 चिंचवड

मो ८६९८०५३२१५   

≈ संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ “आई की पत्नी…?” – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुति – शामला पालेकर ☆

शामला पालेकर

? वाचताना वेचलेले ?

☆ “आई की पत्नी…?” – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुति – शामला पालेकर

एकदा पत्नीने मला सहज विचारले…

“सांगा ना, जर कधी अशी वेळ आली की तुझी आई किंवा मी… आमच्यापैकी एकीचीच निवड करावी लागली, तर तू कोणाला निवडशील?”

 

प्रश्न साधाच होता…

पण उत्तर देताना अनेक नात्यांचे ओझे मनावर येऊन बसले.

 

मी काही क्षण शांत राहिलो…

आणि मग हळूवार पणे म्हणालो,

“मी… माझ्या आईची निवड करीन.”

 

क्षणात तिचा चेहरा उतरला.

ती हळव्या आवाजात म्हणाली..

“ज्याच्यासाठी मी माझे माहेर सोडले…

आई-वडील, भाऊ-बहीण सोडले…

सगळे आयुष्य तुझ्यावर विश्वास ठेवून तुझ्या घरी आले…

त्याच माणसाच्या आयुष्यात मी दुसऱ्या क्रमांकावर आहे…?”

 

तिच्या डोळ्यांतील दुःख मला दिसत होते.

मी तिचे हात हातात घेतले आणि शांतपणे म्हणालो…

“अगं वेडे… माझे उत्तर तुझ्यावरच्या प्रेमाचे मोजमाप नाही.

ते माझ्या संस्कारांचे प्रतिबिंब आहे.

आज जर मी माझ्या पत्नीसाठी माझ्या जन्मदात्या आईला दूर केले…

तर, उद्या आपला मुलगाही त्याच्या पत्नीसाठी स्वतःच्या आईला… म्हणजे तुलाच… दूर करणे योग्य समजेल.

आणि त्या दिवशी तुझ्या डोळ्यांतले अश्रू मी कधीच पाहू शकणार नाही.

म्हणून मला माझ्या मुलांना एवढेच शिकवायचे आहे—

आईचा सन्मान करताना पत्नीचा अपमान करू नका…

आणि पत्नीवर प्रेम करताना आईला विसरू नका.

कारण प्रेम म्हणजे कोणाला जिंकणे नाही…

तर प्रेम म्हणजे कोणालाही न हरवता सगळ्यांना जपणे.”

 

हे ऐकून तिच्या डोळ्यांतले अश्रू अलगद ओघळले…

पण त्या अश्रूंमध्ये पराभव नव्हता…

होता तो माझ्या विचारांचा स्वीकार…!

आणि दोन्ही नात्यांचा सन्मान करणाऱ्या एका घराचा सुंदर पाया…!

 

लक्षात ठेवायला हवे…

आई ही जीवनाची सुरुवात आहे…

पत्नी ही जीवनप्रवासाची साथ आहे…

 

एकीने जन्म दिला…

दुसरी आयुष्याला अर्थ देते…

या दोघींपैकी कोण मोठे? कोण जवळचे? कोण अधिक प्रेमाचे? हे प्रश्नच चुकीचे आहेत.

 

कारण घर तेव्हा स्वर्ग बनते, जेव्हा तिथे तुलना नसते…

अहंकार नसतो…

तर असतो फक्त परस्परांचा आदर, प्रेम आणि जपणूक.

 

खरा पुरुष तो नाही जो एका नात्यासाठी दुसरे नाते तोडतो…

खरा पुरुष तो आहे, जो दोन्ही नात्यांना न्याय देतो, दोघींच्या डोळ्यांत विश्वास ठेवतो आणि पुढच्या पिढीला नात्यांचा खरा संस्कार देतो.

 

लेखक :अज्ञात

प्रस्तुती : शामला पालेकर

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ ‘वारकरी आणि रामदासी : महाराष्ट्रातील भक्तिपरंपरेतील दोन समन्वयी प्रवाह’ ☆ श्री दिवाकर बुरसे ☆

श्री दिवाकर बुरसे

🌸 विविधा 🌸

☆ ‘वारकरी आणि रामदासी : महाराष्ट्रातील भक्तिपरंपरेतील दोन समन्वयी प्रवाह’ ☆ श्री दिवाकर बुरसे

प्रस्तावना

महाराष्ट्राच्या सांस्कृतिक इतिहासात संतपरंपरेचे स्थान अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. मध्ययुगीन भारतात उदयास आलेल्या भक्तीचळवळीने समाजजीवनात नवा आध्यात्मिक आणि सामाजिक दृष्टिकोन निर्माण केला. या चळवळीने धर्माचे तत्त्वज्ञान केवळ शास्त्र आणि मठांच्या मर्यादेत न ठेवता ते सामान्य जनतेपर्यंत पोहोचवण्याचे कार्य केले.

महाराष्ट्रात या भक्तिप्रवाहाचे विविध स्वरूप दिसून येते. वारकरी संप्रदाय, महानुभाव परंपरा, दत्तसंप्रदाय, नाथसंप्रदाय आणि समर्थ रामदासांनी प्रेरित केलेला रामदासी संप्रदाय हे या व्यापक भक्तिपरंपरेचे महत्त्वाचे घटक आहेत.

यांपैकी वारकरी संप्रदाय आणि रामदासी संप्रदाय हे दोन प्रवाह विशेष प्रभावी मानले जातात. वरवर पाहता या दोन्ही परंपरांमध्ये काही तात्त्विक व आचारभेद दिसतात; तथापि सखोल अभ्यास केल्यास असे आढळते की या दोन्ही परंपरांचा उगम भागवत वैष्णव भक्तीच्या समान तत्त्वज्ञानातून झाला आहे. त्यांच्या कार्यपद्धतीतील भिन्नता ही मुख्यतः त्या काळातील सामाजिक व राजकीय परिस्थितीमुळे निर्माण झाली आहे.

वारकरी संप्रदाय : भक्ती, समता आणि लोकधर्म

वारकरी संप्रदाय हा महाराष्ट्रातील सर्वात व्यापक आणि लोकाभिमुख असा भक्तिपंथ आहे. या संप्रदायाचे केंद्रस्थान पंढरपूर येथील श्रीविठ्ठल मंदिर आहे. आषाढी आणि कार्तिकी एकादशीला लाखो वारकरी पायी पंढरपूरला जाऊन विठ्ठलदर्शन घेतात. या यात्रेला ‘वारी’ असे संबोधले जाते.

वारकरी भक्तीमध्ये विठ्ठल हा विष्णू किंवा श्रीकृष्णाचे रूप मानला जातो. भक्त आणि देव यांच्यातील संबंध अत्यंत आत्मीयतेचा असतो. विठ्ठल हा भक्तांचा सखा, मायबाप, बंधू किंवा कुटुंबातील सदस्य म्हणून अनुभवला जातो.

वारकरी परंपरेचे सर्वात महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे समता आणि सर्वसमावेशकता. या संप्रदायात जातिभेद, सामाजिक उच्च-नीचता किंवा धार्मिक संकुचितपणा यांना स्थान नाही. संतज्ञानेश्वर, नामदेव, एकनाथ, तुकाराम, चोखामेळा, सावता माळी, जनाबाई इत्यादी संतांनी आपल्या अभंगांद्वारे भक्तीचा संदेश सर्व स्तरांपर्यंत पोहोचवला.

संतज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी या ग्रंथाद्वारे भगवद्गीतेचे तत्त्वज्ञान मराठी भाषेत सर्वसामान्यांसाठी उपलब्ध करून दिले. संत तुकारामांच्या अभंगांनी वारकरी भक्तीला व्यापक लोकाधार मिळवून दिला.

समर्थ रामदास आणि सतराव्या शतकातील सामाजिक परिस्थिती

सतराव्या शतकात समर्थ रामदास स्वामींचा उदय झाला. त्यांनी भारतभर तीर्थयात्रा करून समाजजीवनाचे निरीक्षण केले. त्या काळात भारतातील अनेक प्रदेशांवर परकीय सत्तेचे वर्चस्व होते आणि सामाजिक तसेच राजकीय अस्थिरता निर्माण झाली होती.

या परिस्थितीत समाजात आत्मविश्वास, नैतिकता आणि संघटन यांची गरज निर्माण झाली होती. समर्थांनी भक्तीच्या आधारावर समाजजागृती आणि संघटन यांचा कार्यक्रम हाती घेतला.

समर्थ रामदासांचा दासबोध हा ग्रंथ त्यांच्या विचारांचा प्रमुख स्रोत मानला जातो. या ग्रंथात भक्ती, विवेक, वैराग्य, कर्तव्य आणि समाजधर्म यांचे महत्त्व स्पष्टपणे मांडलेले आहे.

रामदासी संप्रदाय : भक्ती आणि कर्तृत्वाचा समन्वय

समर्थ रामदासांनी श्रीराम आणि हनुमान यांच्या उपासनेचा मार्ग समाजासमोर ठेवला. श्रीराम हे धर्मसंस्थापन आणि आदर्श राजधर्माचे प्रतीक आहेत, तर हनुमान हे शक्ती, बुद्धी आणि स्वामिनिष्ठेचे प्रतीक मानले जातात.

समर्थांनी देशभर अनेक मठ आणि मारुती मंदिरे स्थापन केली. या माध्यमातून त्यांनी समाजात बलोपासना, संघटन आणि कर्तव्यभावना जागृत करण्याचा प्रयत्न केला. या कार्यातून ‘रामदासी संप्रदाय’ किंवा ‘समर्थ संप्रदाय’ विकसित झाला.  

या संप्रदायात भक्तीबरोबरच समाजधर्माची जाणीवही महत्त्वाची मानली जाते.

वारकरी आणि रामदासी संप्रदाय : तुलनात्मक दृष्टिकोन

घटक: वारकरी संप्रदाय ‘ वा’

रामदासी संप्रदाय ‘ रा’

आराध्य देव

वा: विठ्ठल (विष्णू/कृष्ण)

रा: श्रीराम व हनुमान

प्रमुख संत

वा: ज्ञानेश्वर, नामदेव, तुकाराम

रा: समर्थ रामदास

मुख्य साधना

वा: नामस्मरण, अभंग, वारी

रा: उपासना, शिस्त, बलोपासना

तत्त्वज्ञान

वा: भक्ती आणि समता

रा: भक्ती आणि कर्तव्य

सामाजिक कार्य

वा:लोकधर्म आणि समता

रा: संघटन आणि नैतिक जागृती

या तुलनेवरून स्पष्ट होते की दोन्ही संप्रदायांचे मूलतत्त्व भक्ती आहे. त्यांच्या कार्यपद्धतीत मात्र काळानुसार भिन्नता दिसते.

राम आणि विठ्ठल : तात्त्विक एकात्मता

समर्थ रामदासांनी रामभक्तीचा पुरस्कार केला असला तरी त्यांनी विठ्ठल आणि राम यांना तात्त्विकदृष्ट्या वेगळे मानले नाही. पंढरपूर येथे विठ्ठलदर्शन घेताना त्यांना विठ्ठलामध्येच श्रीरामाचे दर्शन झाल्याची परंपरा सांगितली जाते. त्या प्रसंगी त्यांनी उच्चारलेले शब्द प्रसिद्ध आहेत —

“येथे का उभा श्रीरामा

मनमोहन मेघश्यामा।”

या काव्यरचनेत राम आणि विठ्ठल यांचे मूलतत्त्व एकच असल्याची भावना व्यक्त होते.

 समारोप

महाराष्ट्राच्या संतपरंपरेचा विचार करताना वारकरी आणि रामदासी या दोन परंपरांचा समन्वय लक्षात घेणे अत्यंत आवश्यक आहे. वारकरी संप्रदायाने भक्तीचा लोकाभिमुख मार्ग समाजासमोर ठेवला, तर समर्थ रामदासांनी भक्तीबरोबरच संघटन, नैतिकता आणि कर्तृत्वाचा संदेश दिला.

या दोन परंपरा विरोधी नसून परस्परपूरक आहेत. विठ्ठल आणि श्रीराम हे विष्णूच्या एकाच तत्त्वाची भिन्न रूपे मानली जातात. त्यामुळे वारकरी आणि रामदासी हे भक्तिपरंपरेचे दोन समन्वयी प्रवाह आहेत असे म्हणणे अधिक योग्य ठरेल.

 

©️ लेखकः दिवाकर बुरसे, पुणे

संपर्कः ९५ ५ २६ २ ९२ ४ ५

 

🌼🌼🌼

 

संदर्भग्रंथ

१. रा. चिं. ढेरे — श्रीविठ्ठल : एक महासमन्वय

२. रा. चिं. ढेरे — महाराष्ट्राचा देव्हारा

३. ग. ह. खरे — समर्थ रामदास

४. डॉ. ह. गो. तुळपुळे — संतसाहित्याचा इतिहास

५. दासबोध — समर्थ रामदास

६. ज्ञानेश्वरी — संत ज्ञानेश्वर

७. तुकाराम गाथा

🙏🏻

© श्री दिवाकर बुरसे

पुणे

संपर्कः ९२८४३००१२५, ९५५२६२९२४५

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ नलावडे बाईंची शाळा… ☆ डॉ मकरंद पिंपुटकर ☆

डॉ मकरंद पिंपुटकर

??

☆ नलावडे बाईंची शाळा… ☆ डॉ मकरंद पिंपुटकर 

नलावडे बाईंची शाळा – – 

गोरेगाव, मुंबई येथे माझी सन्मित्र मंडळाची शाळा. तळमजल्यावर बालवाडी ते चौथीपर्यंतच्या इटुकल्या पिटुकल्यांचा कलकलाट ऐकू येतो, हीच ती बैरामजी जीजीभॉय प्राथमिक शाळा. याच शाळेत १९७९ साली सौ. गीता वासुदेव नलावडे – आमच्या नलावडे बाई यांनी आपल्या कारकिर्दीला सुरुवात केली आणि माझ्यासकट शेकडो मुलांच्या आयुष्याला वेगळीच कलाटणी दिली.

बाई शिक्षिका म्हणून रुजू झाल्या तेव्हा त्यांचे शिक्षण फक्त ११वी मॅट्रिक व DEd पर्यंतच होतं. लग्नानंतर नोकरीबरोबरीने शिक्षण चालू ठेवण्याचा आग्रह व सक्रिय पाठिंबा नवऱ्याचा हे त्या आग्रहाने नमूद करतात. MA, DEd झालेल्या बाई वयाच्या अवघ्या तिसाव्या वर्षी प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका झाल्या होत्या.

तुमच्या पैकी ज्यांना १ – २ मुलं आहेत, त्यांनी त्या मुलांची लहानपणाची वयं आठवा. त्यांची दंगामस्ती, क्षणाक्षणाला बदलणारे त्यांचे मूड व रंगढंग आठवा. दर वर्गात अशा ४०-५० मुलांना बरोबर घेऊन वर्षानुवर्षं स्वत:चं डोकं शांत ठेवत या मुलांना ठाकून ठोकून तयार करण्याच्या आपल्या कामात बाईंनी स्वत:ला गुंतवून घेतलं. मला वाटतं देव प्राथमिकच्या शिक्षकांना जास्ती पेशन्सचा बोनस देत असावा.

मुलांनी चावटपणा करून ‘बाई तुमचं अक्षर चांगलं नाही, वाचता येत नाहीये’ असं म्हटले किंवा उगाच व्याकरणाच्या चुका काढल्या तरी अशा घटनांचा बाऊ न करता बाईंनी या गोष्टी आपल्याला सुधारणेला वाव आहेत म्हणून स्वीकारल्या – त्या मुलांबद्दल कोणताही राग वा आकस न बाळगता.

सगळ्यांच्यातच काही ना काही चांगले आहे हा बाईंचा ठाम विश्वास. ते शोधून काढणे व त्यांना तशी काम देणे यात बाईंचा हातखंडा. त्यामुळे आपण इकडचे कामाचे डोंगर तिकडे केलेत याचे भान ना त्या सह-शिक्षिकांना रहातं ना त्या मुलांना. कोणाचं चुकलं की त्याला धपाटे देईन हं असे म्हणायचं (बाई मारायच्या नाहीत कधी, नुसतीच शाब्दिक धमकी) आणि बरोबर आले की पैकीच्या पैकी मार्क देऊन टाकायचे असा सगळा रोखठोक कारभार.

कोणतीही अवघड परिस्थिती आल्यावर न डगमगता तिचा सामना करणे ही बाईंची खासियत. मग बोरिवलीच्या नॅशनल पार्कमध्ये चाळीस विद्यार्थी सहलीला घेऊन गेल्या असता वाघोबा आमने सामने येणं असो किंवा कोकणात किर्र अंधाऱ्या रात्री सुनसान रस्त्यावर मुलांना सोबत घेऊन बसची वाट पहाणं असो किंवा सिंहगड किल्ल्यावरून वांड मुलांना घेऊन अंधारात खाली येणं असो.

कुठेही गैरप्रकार दिसला किंवा आपल्या मुलांना कोणी त्रास देताना दिसलं की तिथे मात्र दयामाया हा शब्द बाईंच्या शब्दकोशात नसतो. आमच्याच माध्यमिक शाळेतल्या मुलीची एका मवाल्याने – स्थानिक गुंडाने – छेड काढल्यावर, पुरुष सहकारी चाचरताना, रणरागिणीचे रूप घेऊन बाईंनी भर रस्त्यात त्याच्या मुस्कटात भडकावून पोलिसांच्या स्वाधीन केले होते.

मुलांच्या विकासासाठी, अनेकानेक सामाजिक कामांसाठी बाईंनी विविध उपक्रम शाळेत राबवले. श्वास चित्रपटासाठी मुलांनी स्वत: आकाशकंदील बनवून विकले व आलेले पैसे अभिनेता अरुण नलावडे यांना दिले होते.

खुर्चीत असले की मी शिक्षक / मुख्याध्यापिका आहे, शाळा सुटली की मी तुमच्यातलीच आहे – तुमची मैत्रीणच आहे – असं सहशिक्षिकांना आवर्जून सांगणाऱ्या बाई सतत नवीन गोष्टी शिकण्याचा आग्रह धरतात. बाईंचे सर्व सहकाऱ्यांशी इतके घरच्यासारखे संबंध होते की सर्वोत्कृष्ट शिक्षकाच्या महापौर पुरस्कारासाठी करावयाचा अर्ज व फाइल सहशिक्षिकांनीच तयार केली व पाठवली. बाईंना १९९७-९८ सालाचा महापौर पुरस्कार मिळाला व पुढे अतिशय बहुमानाचा २००९-१० चा आदर्श शिक्षिकेचा राष्ट्रपती पुरस्कारही. बाईंच्या अथक प्रयत्नांनी व सोमण बाई, बर्वे बाई, पाटील बाई, धारप बाई, सुमन ताई आणि त्यांच्या अगणित सहकाऱ्यांच्या साथीने शाळेला २०००-०१ सालचा आदर्श शाळा पुरस्कार मिळाला, A ग्रेडसुद्धा मिळाली व मिळत राहिली.

बाईंनी आम्हा दिवट्यांच्याच आयुष्यात प्रकाश पाडला असं नाही तर त्या आम्हा विद्यार्थ्यांच्या कुटुंबाचा एक अविभाज्य घटकच होत्या – आहेत. कुटुंबाला उभं करताना बाईंनी विद्यार्थ्यांच्या आई वडिलांना मदत केली आहे, आर्थिक मदत तर केलीच पण कित्येकांचे संसारही मोडण्यापासून वाचवले आहेत.

“असंही माझ्या डोळ्यात पटकन पाणी येतं. पण एकदा तर फारच अवघड परिस्थिती झाली होती, ” बाई सांगत होत्या, “एक गरीब मुलगा होता, त्याला आपल्या शाळेत शिशु वर्गात प्रवेश घ्यायचा होता. त्याची आई धुणी भांडी करायची. शाळेत प्रवेश घेण्यापूर्वी १, ००० रुपये refundable deposit घ्यायचं असायचं. हे म्हटल्यावर तिने रुमालाची पुरचुंडी काढली. त्यात तिने वेळोवेळी साठवलेल्या रुपया, दोन-पाच रुपयाच्या नोटा होत्या. पण ते सगळे पैसे जेमतेम चार – पाचशेच भरत होते. मी तिला सांगितलं तुमच्या मुलाचं नाव लागलंय, तुम्ही काळजी करू नका. पण शक्य तेवढ्या लवकर उरलेले पैसे भरून टाका म्हणजे प्रवेश पक्का होईल, तर ती दुसऱ्याच दिवशी हजर. हातात पन्नासच्या नव्या नोटा. क्लार्कला पैसे द्या म्हणून सांगणार इतक्यात माझं लक्ष तिच्या ओक्याबोक्या गळ्याकडे गेलं. तिने तिचं मंगळसूत्र गहाण ठेवून पैसे उभे केले होते. बापरे, तिला ते पैसे तसेच परत केले आणि मंगळसूत्र सोडवून आणायला सांगितले. माणसं चांगली असतात रे, परिस्थिती त्यांना वाईट बनवते. ”

बाईंच्या कुंडलीत मुलांशी गट्टी असा एक मोठ्ठा योग आहे. शाळा सोडून वर्षे उलटून गेली तरी जगाच्या कानाकोपऱ्यातून बाईंना फोन येत असतात. कुठल्याही गोष्टीचा मुलांच्या angle ने विचार करणे, त्यांच्या मनात शिरणे ही हातोटी साधलेल्या बाई विद्यार्थीप्रिय झाल्या नसत्या तरच नवल होतं.

आणि ही गट्टी मुलांनी शाळा सोडल्यावर, त्यांची शिक्षणं पूर्ण झाल्यावर, अगदी नोकऱ्या लागल्यानंतर पार लग्नानंतरसुद्धा तितकीच घट्ट रहाते. फक्त नंतर झुकतं माप मुलांपेक्षा कुटुंबातील नव्या members ना – सुना-जावयांना दिलं अशी जरा एक गोड तक्रार मात्र येते.

देश विदेशी विखुरलेल्या आम्हा नर रत्नांना बाईंना प्रत्यक्ष भेटण्याची सुवर्णसंधी मिळाली गेल्या वर्षीच्या जानेवारीत (२०१९). निमित्त होतं शाळेच्या ६० वर्षं पूर्ण होण्याचं. माजी विद्यार्थी संघाने शाळेच्या सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा सत्कार करण्याचा घाट घातला होता. कार्यक्रम संपल्यावर बाईंनी सांगितलं की राष्ट्रपती पुरस्काराच्या वेळेला खूप बंधनं होती, नियमावली होती. इथं तसं नव्हतं. इथं माझ्यात आणि माझ्या मुलांच्यात कोणताच अडथळा नव्हता, त्यामुळे त्या पुरस्कारापेक्षा हा पुरस्कारच मला जास्त भावतो.

निवृत्तीनंतर बाई आता DSK विश्व पुणे येथे स्थायिक झाल्या आहेत. निवृत्तीनंतर म्हणजे शाळेतून निवृत्ती, बरं का! कारण सोसायटीत सगळ्यांनी गळ घालून बाईंना कमिटीवर घेतले. मग गरजेनुसार धपाटे देईन हं म्हणून आणि पैकीच्या पैकी मार्क्स देऊन काम करवून घेण्याचा त्यांचा शिरस्ता आता या मुक्कामी चालू आहे.

बाईंची धावपळ व सामाजिक बांधिलकी अजून चालूच आहे. मुंबईत रात्र शाळेच्या त्या सह सचिव (joint secretary) आहेत. पुण्यात त्यांचं भगवद्गीता, सप्तशतीचा पाठ शिकणे, पठण करणे चालू असतं. DSK विश्वमधील ज्येष्ठ नागरिक संघाच्या सदस्य व बाई यांनी एके दिवशी प्रत्येकी एक एक समास हाती लिहून काढून एका दिवसात संपूर्ण दासबोध लिहूनही घेतला, त्या हस्तलिखिताचं binding करून घेतलं आणि ते बाड शिवथरघळीत पादुकांवर ठेवलंही.

समर्थ दासबोधात दहाव्या समासात म्हणतात :

 

महंते महंत करावे,

युक्तीबुद्धीने भरावे,

जाणते करून विखरावे,

नाना देशी.

 

समर्थच असेही म्हणतात की

आपणासी जे ठावे,

ते ते दुसऱ्यासी सांगावे,

शहाणे करून सोडावे,

सकळ जन.

हल्लीच्या काळात पु ल आपल्या चितळे मास्तरांच्या मुखाने सांगतात – आयुष्यात व्रत एकच केले. पोरगं सापडलं तावडीत की त्याला घासूनपुसून जगात पाठवून देणं.

बाई अख्खं आयुष्य याच तत्वांवर जगत आल्या आणि अजूनही ती वाटचाल चालूच आहे.

जुन्या काळच्या एकत्र कुटुंबांत आजीची ढीगभर नातवंडे असत. सगळ्याच नातवंडांना वाटायचे की आपणच आजीचे लाडके. बाईंच्या आम्हा सगळ्या विद्यार्थ्यांचं तसंच आहे. आणि या प्रेमाचा अभ्यासातील गुण किंवा जीवनातील यशस्वी होण्या न होण्याशी अर्थाअर्थी काही संबंध नसतो बरं का!

आणि हो, बाई शाळेतून कधीच निवृत्त झाल्या पण आजही मुंबईत, सरकार दप्तरी गोरेगावची बैरामजी जीजीभॉय शाळा “नलावडे बाईंची शाळा” म्हणूनच ओळखली जाते, बरे का!

© डॉ मकरंद पिंपुटकर

चिंचवड

मो ८६९८०५३२१५   

≈ संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ “प्रिय कामवाल्या बाईस…” – लेखिका : अनामिका ☆ प्रस्तुती – स्मिता पंडित ☆

स्मिता पंडित

??

☆ “प्रिय कामवाल्या बाईस…” – लेखिका : अनामिका ☆ प्रस्तुती – सौ. स्मिता पंडित

प्रिय कामवाल्या बाईस,

 साष्टांग दंडवत!

तू आमचे काम सोडून गेलीस त्याला आता महिना होऊन गेला. तुझी वाट बघून, फोन करून मी थकले पण तू काही परत आली नाहीस की फोन उचलला नाहीस.

आजारी आहे म्हणून सुट्टी घेतलीस ती काम सोडण्यासाठीच. तुझे ते न सांगता काम सोडणे माझ्या मनाला खूप लागले. वाटले काय कमी होते तुला आमच्या घरी?

 तू तुझ्या सवडीनुसार कामाला यायचीस, भराभर कामे उरकायचीस, हक्काने रोज चहा आणि जेवण पण मागायचीस, दर रविवारी सुट्टी, दिवाळी बोनस, गरजेला आगाऊ रक्कम देत होतोच. जुने कपडे/ भांडी/ पुस्तके/ वस्तू / रद्दी हे सगळे तुझ्याच स्वाधीन करायचो आम्ही. असे काय कमी पडले म्हणून तू गायब झालीस?

तशी तू हुशार होतीस, हिंदी बरोबर तुला थोडे इंग्रजी पण यायचे म्हणून मला कौतुक वाटायचे. गप्पा मारायला तुला खूप आवडायचे. सगळ्या बातम्या मला तुझ्यामुळेच कळत, एवढेच नाही तर बाजारात काय नव्या गोष्टी आल्या आहेत हे पण तूच सांगायचीस, जसे की साड्या, ड्रेस, बांगड्या, दागिने, भांडी, मशिन वगैरे वगैरे…

 तू अगदी हौशी होतीस, स्मार्टफोन पण माझ्या आधी तुझ्याकडे आला होता. तुला त्याचा उपयोग करता येत नव्हता ही गोष्ट निराळी! पण आपल्याकडे सगळ्या इलेक्ट्रॉनिक वस्तू असाव्यात असा तुझा एक अट्टाहास असायचा.

त्यात काही गैर नव्हते पण या वस्तू तुला माझ्याकडून (किंवा इतरांकडून) मिळाव्यात असे वाटायचे. मग घरात काही नवी वस्तू आणली की लगेच जुनी वस्तू मला द्या म्हणून मागे लागायचीस. नवा लॅपटॉप, टीव्ही आला की जुना तुला पाहिजे म्हणायचीस. नवा मिक्सर आणला, तुला जुना दिला. अशा कित्येक गोष्टी तुला दिल्या.

दर महिना पगार होताच पण तू सतत काहीतरी मागत असायचीस. तुझी नजर सारखी घरातल्या गोष्टींवर भिरभिरत असायची. माझ्या घरी काय काय वस्तू आहेत आणि त्या कोठे ठेवल्या आहेत हे माझ्यापेक्षा तुला जास्त माहिती असायचे.

का कोणास ठाऊक पण मला तुझ्या या सगळ्या गुण दोषांची इतकी सवय झाली होती की मला त्यात काही वावगे वाटायचे नाही. कामवाल्या बायका अशाच असतात अशी माझी एक समजूत!

पण हे सगळे अती होत चालले होते. तुझा अहंकार आजकाल वाढत होता. माझ्याशिवायकाही कामे होत नाहीत हे तुला कळून चुकले होते. त्यामुळे तुला नाखुष कोणी करत नव्हते.

 अलीकडे तर तू मला कॉफीची ऑर्डर सोडू लागलीस. पाव नको बिस्किट द्या, शिळे नको ताजे द्या. मी समजू शकते हे, पण तू एकदा मला शिरा करून द्या म्हणालीस, आणि लाडू पण बरेच दिवसात दिला नाही खायला असे म्हणालीस, हा धक्काच होता मला.

 माझ्या हातचे सांबार तुला खूप आवडायचे. ते केले की मी आधी तुला द्यायचे मग आम्ही खायचो. गोष्टी इतक्या थराला गेल्या.

पण काय करणार, आमचे हात बांधले होते. तुला गमावून चालणार नव्हते म्हणून मुकाट्याने सगळे सहन केले. म्हटले ही सोडून गेली तर रोज भांडी कोण घासणार? झाडू कोण मारणार? फरशी कोण पुसणार? आपल्याला काही झेपणार नाही हे.

 आणि कामवाली बाई बदलली तरी हीच तर्‍हा असणार हे मी अनुभवावरून जाणून होतेच. धरलं तर चावतंय आणि सोडलं तर पळतंय असेच काहीसे झाले होते…

पण कोणत्याही गोष्टीला शेवट असतो. तुझी वाट बघता बघता ७/८ दिवस मी सगळी कामे केली. नाहीतरी मी भांडी स्वछ धुवूनच तुला घासायला ठेवत असे, आता फक्त साबण लावून धुवून टाकायची, आणि लक्षात आले की जमतंय…

 सुरुवातीला खूप त्रास झाला, वेळ पण बराच लागला कारण या कष्टाची सवय नव्हती. दुसरी कामवाली बाई पण विचारून गेली पण मी मात्र ठरवले होते आता या कामवाल्या बायकांचे कौतुक बस्स झाले.

 माझा पण आता थोडा आत्मविश्वास वाढत होता, आपण ही कामे करू शकतो आणि जास्त चांगली करू शकतो हेही लक्षात आले. नवरा पण मदत करू लागला, मुलाला पण थोडे ट्रेनिंग दिले.

 ही कामे करता करता आमच्यातला संवाद वाढला. एवढेच नाही तर आम्ही घरा-दाराशी, भिंतींशी, घरातल्या वस्तू, भांडी-कुंडी, फर्निचर या सार्‍या गोष्टींशी बोलू लागलो.

साफसफाई करताना अधिक काळजी घेऊ लागलो. घराचा कोपरान् कोपरा लख्ख झाला.

 आम्हा बायकांना भांड्यांविषयी जरा जास्त प्रेम असतेच. आता भांडी घासताना ते उतू जाऊ लागले. भांडी जास्त चमकू लागली.

तुला दर पंधरा दिवसांना लिक्विड सोपची मोठी बाटली लागायची. आता तीच बाटली मी दीड महिना वापरते आहे. भांडी घासताना तू खूप पाणी वाया घालवत होतीस, बर्‍याचदा सांगून पण तू ऐकले नाहीस. एवढे पाणी वापरुन पण भांड्यांवरचा साबण तसाच राहायचा. मला परत परत ते भांडे धुवायला लागायचे.

 तुझ्यामुळे आत्तापर्यंत आम्ही किती किलो साबण खाल्ला असेल कोणास ठाऊक?

अजुन बर्‍याच गोष्टी कळल्या. भांडी मीच घासत असलेने स्वयंपाक घरातील भांड्यांची संख्या कमी झाली. भांड्यांचा एक सेट पुरतो आता. शिवाय भांडी चेपली जात नाहीत, पोचे येत नाहीत अगर हँडल तुटत नाही की काचेची भांडी फुटत नाहीत.

 चार मोठ्या खोल्यांचा केर तू ५ मिनिटांत काढायचीस आणि १० मिनिटात फरशी पुसून टाकायचीस.

वाटायचे काय फास्ट बाई आहे, पण आता कळते की तू सोफा, कॉट, खुर्ची, टेबलखाली धुळ ठेवत होतीस. आता मी या सगळ्या वस्तू वेळोवेळी हलवून त्या खालचा केर काढून मग पुसून घेते. आता प्रत्येक वस्तू कशी लखलखते आहे.

 तीच गोष्ट बाथ-रूमची. तू प्रचंड प्रमाणात हर्पिक, फिनेल वगैरे केमिकल्स नुसती ओतत होतीस. पण तरीही ते स्वच्छ वाटत नव्हते. कारण तू जोर लावून कामे करत नव्हतीस. ,

 आता या सगळ्या सफाईच्या खाचा-खोचा मला माहिती झाल्या आहेत. त्यामुळे कमीत कमी केमिकल्स वापरुन फरशी आणि बाथ-रूम एकदम चकचकीत झाले आहे. अगदी नव्यासारखे. येऊन बघ एकदा!

 कोणी तरी म्हटले आहे की माणूस हा सवयीचा गुलाम आहे. कोणतीही सवय अंगवळणी पडायला माणसाला साधारण २१ दिवस लागतात. त्याचा प्रत्यय आला.

 ही कामे करायला मला आता जास्त कष्ट किंवा वेळ लागत नाही. अगदी हातासरशी ही कामे होतात.

 भांडी घासता घासता मी मोबाइल वर माझी आवडती सिरियल पण बघते. झाडू-पोछा करताना छान गाणी लावते आणि त्या तालावर कामे कधी संपतात ते देखील कळत नाही मला.

अजून एक, हे सारे करताना माझे हात त्या उग्र रसायनांपासून जपतेय. रबरी हातमोजे वापरुन.

आता तुझी वाट बघणे नाही, तू येशील की नाही ही धाकधुक नाही. अचानक पडलेल्या कामांचा ढीग नाही की ते होणार कसे याचे टेन्शन पण नाही.

खरच आता मला जास्त रिलॅक्स वाटताय. स्वावलंबी असण्याचा अर्थ कळतोय. न जाणो अजून काही काळानंतर अमेरिकेसारखी कामवाल्या बायकांची कमतरता भासू शकते आपल्या भारतात सुद्धा… म्हणून आतापासूनच तयार आहे मी.

 तू आमचे काम सोडून मला स्वतःच्या क्षमतेची जाणीव करून दिलीस. बऱ्याच गोष्टी तुझ्या कडून शिकले. आता मला तू गुरू स्थानी.. म्हणून तुला दंडवत!

एका रविवारी नक्की घरी ये हा बदल पहायला!

तुझी

दीदी 

लेखिका : अनामिका.

प्रस्तुती : सौ. स्मिता पंडित

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ मनाचे श्लोक – एक सार्वकालिक ‘मनोपनिषद’… – श्लोक ७९ आणि ८० ☆ श्री विश्वास देशपांडे ☆

श्री विश्वास देशपांडे

? इंद्रधनुष्य ?

☆ मनाचे श्लोक – एक सार्वकालिक ‘मनोपनिषद’… – श्लोक ७९ आणि ८० ☆ श्री विश्वास देशपांडे ☆

श्लोक क्र. ७९ – – 

मना पावना भावना राघवाची ।

धरी अंतरी सोडी चिंता भवाची ।

भवाची जिवा मानवा भूलि ठेली ।

नसे वस्तूची धारणा वेर्थ गेली ।

अर्थ : हे मना श्रीरामांचे स्मरण पवित्र करणारे आहे. त्यांचे स्मरण कायम आपल्या अंतरात म्हणजे म्हणजे मनामध्ये ठेव. संसाराची चिंता सोडून दे. या संसाररूपी मायेची भूल मानवाला पडते. जी गोष्ट अस्तित्वातच नाही, अशा गोष्टीची कास धरणे व्यर्थ आहे.

(पावना – पवित्र, भावना- विश्वास/स्मरण, धरी – धारण कर, भवाची – संसाराची, भूलि – भ्रम, वेर्थ – व्यर्थ)

विवेचन : आधीच्या श्लोकात आपल्याला समर्थांनी देह, संसाराची व्यर्थ चिंता वाहू नका असे सांगितले. या श्लोकात ते आपल्याला हा संसार कसा नश्वर आहे ते सांगत आहेत. आपल्या मनामध्ये नेहमीच या संसाराबद्दल एक आंतरिक ओढ किंवा ममत्व असते. शिक्षण, नोकरी, विवाह, मुलेबाळे, पैसा, जमीनजुमला यातच आपल्या जीवनाचे सार्थक आहे असे आपल्याला वाटते. माणूस आयुष्यभर त्यासाठी धडपडत राहतो. परंतु या संसाराची व्यर्थता त्याला शेवटी लक्षात येते. पण त्यावेळी वेळ निघून गेलेली असते.

राघवाचे स्मरण, त्याच्यावरील दृढ श्रद्धा मनाला पवित्र करणारी आहे. कारण तो पतितांना पावन करणारा आहे. आपल्या अंतरात अनेक बऱ्या वाईट भावना, वासना ठाण मांडून असतात. परंतु भगवंताच्या नामाने वासना शुद्ध होत जाते. म्हणूनच समर्थ म्हणतात की हे मना पवित्र करणाऱ्या राघवाची श्रद्धा अंतर्यामी बाळग. त्यासाठी ‘ धरी अंतरी ‘ हे शब्द समर्थांनी वापरले आहेत. अंतर्यामी काय धारण करायचे?  तर राघवाचा विश्वास. आणि काय सोडायचे?  तर ‘ चिंता भवाची ‘ आपण संसारात असताना एवढे त्यात गुंतलेले असतो, की पुढे माझे कसे होईल, म्हातारपणी मुले मला विचारतील ना?  एक ना दोन अशा अनंत चिंता मन करीत राहते. संसाराची व्यर्थ चिंता करून उपयोग नाही. म्हणूनच ही चिंता टाकून द्यावी असे समर्थ सांगतात.

ही चिंता का टाकून द्यायची?  कारण जी गोष्ट मुळात नाहीच आहे, तिच्याबद्दल चिंता करून काय उपयोग?  मोहमायेमुळे हा संसार आपल्याला खरा वाटतो. त्याची भूल आपल्याला पडते. पण खऱ्या सत्यापासून आपण लांब जातो. वाळवंटातील तहानलेल्या माणसाला मृगजळ दृष्टीस पडते. तिथे आपल्याला नक्कीच पाणी मिळेल या आशेने तो त्याच्या शोधात पुढे पुढे जात राहतो. शेवटी त्याला लक्षात येते की आपल्याला जे पाणी वाटले होते, ते तर केवळ मृगजळ! मृगजळ म्हणजे भ्रम. पाणी नाही हे सत्य. त्याप्रमाणेच हा संसार! खरा वाटतो पण अखेरीस त्याची व्यर्थता लक्षात येते. खरी वस्तू एकच. ती म्हणजे भगवंताचे नाम. ते नाम पवित्र करणारे आहे. सत्याची जाणीव करून देणारे आहे. संसाराची व्यर्थता लक्षात आणून देणारे आहे. म्हणून हे मना, असे पवित्र नाम तू हृदयात धारण कर आणि संसाराची व्यर्थ चिंता सोडून दे. जी गोष्ट मुळात नाहीच तिची चिंता करण्यात काय अर्थ?

तुकाराम महाराज म्हणतात, “हेचि थोर भक्ती आवडते देवा, संकल्पावी माया संसाराची. “ भक्ती करणे म्हणजे जी गोष्ट आपल्याला अत्यंत प्रिय असते, ती परमेश्वराला अर्पण करावी. संसार, मुलेबाळे या गोष्टी आपल्या अत्यंत प्रिय असतात. त्यांच्यावर आपले जीवापाड प्रेम असते. हेच प्रेम भगवंताला अर्पण करावे. आणि भगवंताचे प्रेम अंतर्यामी धारण करावे.

स्वसंवाद :: 

१. ज्या शिक्षण, नोकरी, संपत्ती किंवा नात्यांना मी माझ्या ‘जीवनाचे सार्थक’ मानून बसलो आहे, ते खरंच चिरंतन सत्य आहे की केवळ एक तात्पुरता भ्रम (मृगजळ) आहे?

२. “म्हातारपणी माझे कसे होईल?  मुले मला सांभाळतील ना? ” अशा भविष्यातील ‘भवाच्या’ (संसाराच्या) व्यर्थ चिंतांमध्ये मी माझा आजचा दिवस आणि मनाची शांतता गमावत आहे का?

३. माझ्या अंतर्मनात साचलेला बऱ्या-वाईट वासनांचा कचरा साफ करण्यासाठी मी ‘पतितांना पावन करणाऱ्या’ राघवाच्या नामाचा आश्रय किती वेळा घेतो?

४. तुकाराम महाराजांनी सांगितल्याप्रमाणे, मी प्रपंचातील माझी सर्व आसक्ती आणि प्रेम भगवंताच्या चरणी अर्पण करून ‘निर्वासन’ भक्तीचा अनुभव घ्यायला तयार आहे का?

===== 

श्लोक क्र. ८० – – 

धरा श्रीवरा त्या हरा अंतराते ।

तरा दुस्तरा त्या परा सागराते ।

सरा वीसरा त्या भरा दुर्भराते ।

करा नीकरा त्या खरा मछराते ।।८०।।

अर्थ : हे मना, श्रीमहादेवांच्या अंतर्यामी वसलेल्या सीतापती श्रीरामांना आपल्या हृदयात धारण कर. श्रीरामांना अखंड हृदयी धारण करून पार करण्यास अतिशय कठीण असा संसाररूपी सागर तरून जा. जे कितीही भरले तरी अपूर्णच राहते अशा पोटाला (संसाराला)विसरून जा. मत्सराशी निग्रहपूर्वक झगडून साधुसंतांनी सांगितलेल्या मार्गाने जा.

(श्रीवरा – सीतापती श्रीराम /लक्ष्मीपती विष्णू, हरा अंतराते – महादेवांच्या अंतर्यामी वसलेल्या, दुस्तर – कठीण, परा – मोठा, सरा – अंश/छटा, दुर्भर – भरण्यास अतिशय कठीण, नीकरा – प्रयत्नपूर्वक/हट्टाने, खर – गाढव, मच्छराते – मत्सर)

विवेचन : या श्लोकाची रचना भाषिक दृष्टया फार सुंदर आहे. ‘ र ‘ या अक्षराची पुनरावृत्ती झाल्याने अनुप्रास अलंकार साधला गेला आहे. त्याशिवाय रचनेत सहजता आहे. श्रीवर म्हणजे भगवान विष्णू. श्री म्हणजे लक्ष्मी. राम हाही विष्णूचाच अवतार असल्याने येथे सीतापती राम असा देखील अर्थ घेता येतो. अशा या भगवंताला आपल्या हृदयात प्रत्यक्ष महादेव धारण करतात. त्या भगवंताला आपणही आपल्या हृदयी धारण करावे. श्रीरामांची योग्यता किंवा महती एवढी थोर की प्रत्यक्ष देवाधिदेव महादेव त्यांना आपल्या हृदयात स्थान देतात. त्यांचे ध्यान करतात. त्यामानाने आपण तर सामान्य माणसे! तेव्हा अशा या भगवंताला आपण देखील आपल्या हृदयात स्थान द्यावे.

समर्थ संसाराला संसार सागर म्हणतात. एक वेळ एखादी नदी पोहून पार करणे सोपे पण सागर पार करणे महाकठीण. हनुमंत सागर पार करून लंकेला पोहोचला होता. त्याने हृदयात रामनाम धारण केले होते. रामनाम ही एक अशी नौका आहे की जी आपल्याला हा महाकठीण असलेला भवसागर पार करण्यासाठी साहाय्यभूत ठरते. जो या नौकेत बसला, तो हा भवसागर तरून गेला.

पण हा भवसागर म्हणजे एक मायाजाल आहे. ते भल्याभल्यांना सोडवत नाही. भगवंताची माया अत्यंत प्रबळ आहे. एखाद्या कोळ्याच्या जाळ्यात मासे अडकावेत तसा माणूस या मायेच्या जाळ्यात अडकतो. रामकृष्ण परमहंसांनी याबाबत बोलताना एका ठिकाणी अतिशय सुंदर दाखला दिला आहे. ते म्हणतात जे मासे कोळ्याच्या अवतीभवती असतात, ते जाळ्यात अडकतात. पण जे मासे कोळ्याच्या पायाजवळ असतात, ते मात्र जाळ्यात अडकत नाहीत. आपण संसारी माणसे म्हणजे या संसारसागरातील मासे. मायारूपी जाळ्यात आपण अडकतो. पण आपण जर भगवंताच्या पायाशी राहिलो, त्याचे चरण जवळ केले तर मायेच्या जाळ्यातून आपण सहीसलामत सुटू शकतो.

देवाने आपल्याला पोट दिले आहे. पोट ही अशी गोष्ट आहे की ती कधी भरतच नाही. अग्निमध्ये आहुती टाकल्यानंतर अग्नी आणखी प्रज्वलित होतो. तसेच हे आहे. संसाराची आसक्ती देखील अशीच आहे. ती कधीच संपत नाही. म्हणून ती थोडी का होईना पण विसरण्याचा प्रयत्न करावा. ते सोपे नाही. पण भगवंत प्राप्ती करून घ्यायची असेल तर ती बाजूला ठेवता आली पाहिजे.

आपली संसाराची हाव कधी संपत नाही. ‘ हवेपण ‘ सुरूच राहते. त्यातून मग एखादी गोष्ट नाही मिळाली आणि ती दुसऱ्याकडे असेल तर मत्सर किंवा द्वेष निर्माण होतो. मत्सराला काही कारण लागत नाही. म्हणून त्याची तुलना समर्थ गाढवाशी करतात. परमार्थात तर मत्सर अतिशय हानिकारक. तेव्हा अशा मत्सराचा निकराने म्हणजे सर्वशक्तीनिशी सामना करायला हवा. त्यासाठी विवेक आणि वैराग्य ही दोन प्रभावी शस्त्रे आहेत. मत्सर आणि संसाराची आसक्ती टाकून देऊन श्रीरामाला हृदयी धारण करा म्हणजे हा भवसागर तरून जाल असे समर्थांचे सांगणे आहे. ‘ नाम आहे आदी अंती, नाम सर्व सार, आहे बुडत्याला नौका ठेवली आधार. ‘

स्वसंवाद :: 

१. मी या संसारसागरात ‘मायेच्या जाळ्यात’ अडकलो आहे हे मला जाणवते का?

२. “कितीही दिले तरी न भरणारे हे दुर्भर पोट (आसक्ती)” याच्या मागे धावताना, मी कधी समाधानाचा अनुभव घेतला आहे का?

३. जेव्हा मला एखादी गोष्ट मिळत नाही आणि ती दुसऱ्याकडे दिसते, तेव्हा माझ्या मनात नकळत ‘मत्सर’ निर्माण होतो का?

४. संसाररूपी जाळ्यातून सहीसलामत सुटण्यासाठी माझ्या ठायी भगवंताप्रती अनन्य शरणागती आहे का?

– क्रमशः श्लोक श्लोक ७९ आणि ८०

© श्री विश्वास देशपांडे

चाळीसगाव

प्रतिक्रियेसाठी ९४०३७४९९३२

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares