मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ “पन्नाचा हिरा!” ☆ श्री संभाजी बबन गायके ☆

श्री संभाजी बबन गायके

? इंद्रधनुष्य ?

☆ “पन्नाचा हिरा!” ☆ श्री संभाजी बबन गायके

रक्त उपलब्ध होत नाही तोवर शस्त्रक्रिया करणे अशक्य होतं. आज तिसरा दिवस. नऊ वर्षांच्या संतोषची प्रकृती आता अत्यंत नाजूक अवस्थेत पोहोचली होती.

संतोष पटेल चे वडील बांधकाम कारागीर तर आई शेतमजूर. मोठ्या बहिणीच्या लग्नात आई-वडिलांनी जमा केलेली पुंजी खर्ची पडलेली. छोट्या संतोषच्या शारीरिक तक्रारींकडे लक्ष द्यायला पोट भरण्याच्या लढाईत गुंतलेल्या वडिलांना फुरसत नव्हती. ते लोकांची घरं उभारून देत, पण स्वत:ला एक साधं छप्पर मिळवू शकलेले नव्हते निम्मं आयुष्य संपलं तरी. बांधकाम नसेल तेंव्हा विहिरी खोदून देण्याचं जोखमीचं काम करावं लागायचं…. अनेकदा विहिरी ढासळत, पण सुदैवाने डोक्यावर दगड नाही पडला. हात-पाय तर किती तरी वेळा जायबंदी झाले त्याची गणना नाही. आई शेतमजुरी करायची. आणि या दोघांनी मिळून जरा बरी कमाई केली की घरात तांदूळ यायचा. अन्यथा पुढचे दिवस गव्हाची भरड, आणि ती संपली की ज्वारीच्या कण्या… यावर गुजराण करावी! मजुरी आणि अर्धा एकर कोरडवाहू जमीन यापेक्षा जास्त नाही देऊ शकत!

संतोष अभ्यासात हुशार होता, पण आळस करी. मग आई त्याला झाडाला बांधून चोप देई… म्हणे…. या गरीबीतून बाहेर पडायचे असेल तर एकच मार्ग आहे…. शिक्षणाचा!

पोरगं आठवीच्या परीक्षेत जिल्ह्यात पहिलं आलं तेंव्हा आई-वडिलांच्या आशा पल्लवीत झाल्या होत्या. दहावीच्या बोर्ड परीक्षेत ९२% मिळवून प्रथम क्रमांक पटकावला तरीही पुढील शिक्षणाच्या खर्चाचा प्रश्न होताच. मग बांधकामावर विटा वाहणे आणि अशी अन्य कामे करून संतोष थोडाफार हातभार लावत होताच.

पुढे इंजीनियरींगसाठी भोपाळमध्ये आल्यावर भाजीवाल्याने मोफत दिलेल्या भाजीवर दिवस काढले. कुणीतरी मार्केटिंग मध्ये खूप पैसे आहेत, असे सांगितल्यावर तिकडे मोर्चा वळवला… आणि अभ्यासाकडे दुर्लक्ष झाले. यावर आईने अशी काही खरडपट्टी काढली की विचारता सोय नाही! त्या माऊलीने गरिबीशी पैंज लावली होती….. मी नाही जिंकू शकले…. माझा मुलगा जिंकून दाखवेल तुझ्या विरोधातली लढाई!

— आईच्या शब्दांनी पुन्हा मार्गावर आणले खरे पण नोकरी काही मिळेना. वडील म्हणाले… घरी येऊन जनावरं सांभाळ, शेतात लक्ष घाल. बांधकामे तर मिळतात मला अजूनही…. मदतीला आलास तर चांगला रोजगार मिळेल!

गाव गाठलं. योगायोगानं वन विभागात रखवालदाराची तात्पुरती नोकरी मिळाली….. आणि तिथे अभ्यासाला वाव होता. जंगलातली शांतता आणि साहेब लोकांच्या निवासस्थानाबाहेरच्या दिव्यांचा प्रकाश…. मार्ग सापडला. मध्य प्रदेश पब्लिक सर्विस कमिशनची (MPPSC) ची परीक्षा दिली… एकट्याने अभ्यास करून. केवळ चार गुणांनी पहिला प्रयत्न अयशस्वी ठरला… आणि मग आणखी नेट लावत, पंधरा महिन्यांनी झालेल्या त्याच परीक्षेत राज्यात २२ वा क्रमांक पटकावत DEPUTY SUPERINTENDENT OF POLICE पदाला गवसणी घातली! पहिल्या प्रयत्नात अपयश मिळाल्या दिवसापासून दाढी न करण्याची शपथ घेतली होती….. पंधरा महिने वाढलेली दाढी लाल दिव्याच्या गाडीत बसण्याआधी काढली…. जिद्दच होती तशी.

लग्न केलं ते पारंपारिक पद्धतीने. नव्या नवरीची वरात सायकल रिक्षातून काढली होती. एका डी. एस. पी. अधिका-याचे असे लग्न लोकांनी पहिल्यांदाच पाहिले असावे.

आपण सोसलेल्या गरिबीच्या झळा इतरांना बसू नयेत यासाठी विशेष प्रयत्न सुरु केले. विविध माध्यमांमधून नवोदित विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षा, व्यवसाय मार्गदर्शनासाठी साहाय्य मिळवून द्यायला सुरुवात केली. सोशल मिडीयाचा अत्यंत प्रभावी वापर करीत संवाद वाढवत नेला. आज हजारो विद्यार्थी संतोष कुमार पटेल यांच्याशी जोडले गेलेले दिसतात! पडत्या काळात मदतीचा हात दिलेल्या लोकांना शोधून त्यांचे हात हातात घेऊन धन्यवाद देणारा हा अधिकारी… याचे पाय अजूनही जमिनीवर आहेत!

नऊ वर्षांचा संतोष…. वैद्यकीय सुविधा उपलब्ध नाही, शहरात जायला पैसा नाही… मग गावातल्या झाडपाल्यावाल्या बाबांच्या आश्रयाला जाणे आलेच. शरीराच्या वरवरच्या जखमांवर झाडपाला उपयुक्त असतो, हे जरी खरे असले तरी त्यापेक्षा मोठ्या व्याधीने शरीर ग्रासले की मृत्यू ठरलेला. संतोष असाच मरणासन्न अवस्थेत पोहोचल्यावर कुणाकडून तरी उधार उसनवारी करीत त्याला मोठ्या रुग्णालयात आणले होते. शस्त्रक्रिया करायची ठरले.. पण रक्त द्यावे लागणार होते. १९९९ चा तो काळ. त्यावेळी त्या भागात रक्तदान करणे म्हणजे स्वत:ला कमजोर करून घेणे, असा समज होता. त्यामुळे रक्तदान करायला कुणी सहजासहजी तयार होत नसे. संतोषची शस्त्रक्रिया त्यामुळेच वेळेमध्ये होऊ शकली नाही. एक एक दिवस उलटत होता!

संतोष दाखल असलेला WARD तिस-या मजल्यावर होता. संतोषचे वडील सुपारी चघळत असत. असेच चिंतागती बसलेले असताना त्यांनी तोंडातील सुपारी वरून खाली टाकली…. ते नेमके खाली असलेल्या एका सफाई कर्मचा-याने पाहिले. मोठ्या तिरीमिरीतच तो कर्मचारी संतोषच्या वडिलांची खबर घेण्यास वर आला…. त्याने तोंडाचा पट्टा सोडलाच होता… पण संतोषचे वडील शांत उभे राहून दिलगिरी व्यक्त करीत होते. डोळ्यांत आसवे होती. त्या सहृदय कर्मचा-यास वाईट वाटले. त्याने परिस्थिती समजावून घेतली आणि “मी देतो रक्त! ” म्हणून रक्तदान करायला तो तयार झाला…. काहीही अपेक्षा न ठेवता. योगायोगाने त्याचा रक्तगट जुळला आणि संतोषचा जीव बचावला! सख्खे खानदान उपयोगात आले नाही पण हे खूनदान (रक्तदान) करायला अनोळखी माणूस आला…. संतू मास्टर त्याचे नाव! परिस्थितीने दोन गरीब कुटुंबांना रक्ताच्या नात्यात बांधले ते कायमचे.

संतोष पटेल साहेबांचे वडील अधून मधून संतू मास्टर यांच्या घरी जाऊन येत असत. नंतर त्यांचा संपर्क कमी झाला असावा. कारण दोघांची राहण्याची ठिकाणे दूर दूर होती. दिवस पुढे निघून गेले. मोठ्या होत गेलेल्या संतोषकुमार पटेल साहेबांना हे रक्ताचे काका आठवणीत होते. जीवनाच्या धकाधकीत काही गोष्टी मागे पडतात.

पुढे सतना स्टेशनमध्ये साहेबांचे काही काम निघाले आणि त्यांना लहानपणीची ती रक्तदानाची कथा आठवली. त्यांनी त्या रक्तदात्याचे घर शोधण्याचे ठरवले. तीन तास शोधाशोध केल्यावर एका अत्यंत गरीब वस्तीत संतू मास्टर रहात असत…. असे समजले. दोनच महिन्यांपूर्वी एका शाळेत सफाई करताना त्यांना सर्पदंश झाला आणि त्यातच त्यांचा मृत्यू ओढवला होता!

डी. एस. पी. साहेब साध्या वेशात आपल्या सहकारी कर्मचा-यांसह संतू मास्टर यांच्या घरी पोहोचले. त्यांचा मुलगा मजुरीसाठी बाहेरगावी गेलेला आहे. संतू यांच्या दोन मुली आणि थोरल्या मुलीच्या दोन लहानग्या मुलीसुद्धा होत्या घरात. मोठ्या मुलीच्या चेह-यावरून साहेबांनी तीच संतू मास्टर यांची मुलगी हे ताडले. तिच्या पायांना स्पर्श केला… हातावर काही पैसे ठेवले… आशीर्वाद मागितला. म्हणाले…. ‘ मी तुमचा भाऊच आहे…. तुमच्या वडिलांची भेट नाही होऊ शकली. पण त्यांचेच रक्त माझ्या शरीरात वाहते आहे. आयुष्यात काहीही गरज पडली तर तुम्हांला आणखी एक भाऊ आहे, हे लक्षात ठेवा. ‘.. असं म्हणत साहेबांनी त्या लहानग्या मुलींच्याही पायांना स्पर्श करीत आशीर्वाद घेतले! संतू मास्टर यांच्या धाकट्या मुलीच्या लग्नात कन्यादानाची जबाबदारी सुद्धा घेतली!

मागे एकदा बालाघाट दौ-यावर असताना त्यांनी एका वृद्धाश्रमाला भेट दिली होती. साहेबांच्या पत्नीचा वाढदिवस त्यांनी त्या वृद्धाश्रमात साजरा करण्याचे ठरवले होते. तेथील पूरन सिंग ठाकूर नावाच्या एका वृद्धाने पटेल साहेबांना खास पोलिसी पद्धतीने SALUTE केल्यावर पटेल साहेबांनी त्या वृद्धाची चौकशी केली. तर ते साहाय्यक फौजदार निघाले. पत्नीच्या निधनानंतर विमनस्क अवस्थेत त्यांनी घरदार सोडले, लहान मुलाला सोडून ते भटकत हिंडू लागले होते… व्यसने, आजार आणि मानसिक विकार यांनी ग्रासले गेल्याने त्यांना स्वत:बद्दल फार काही सांगता येत नव्हते… आणि त्यांनी घरदार सोडून चाळीस वर्षे उलटून गेली होती. पटेल साहेबांनी त्यांच्या पद्धतीने संवाद साधत तीन गोष्टी जाणून घेतल्या… त्या साहेबांच्या गावाची साधारण माहिती… आणि ते नोकरीत असताना फुटबॉल खेळत असत. या एवढ्या माहितीवरून पटेल साहेबांनी एक रील प्रसारित केला, त्यांच्या पोलिस खात्यातील मित्रांच्या मदतीने पूरन सिंग यांच्या मुलाचा शोध घेतला…. आणि त्यांना त्यांच्या घरी पोहोचवले! अशा अनेक कहाण्या आहेत… या प्रामाणिक आणि माणुसकीची जाण असलेल्या पोलिस अधिका-याच्या!

वर्दीला मान आहे, सन्मान आहे आणि भीतीयुक्त आदरही. या पदावर पोहोचणारे कुठून तिथे पोहोचलेले असतात ते कुणास ठाऊक? पण जे आपली पाळेमुळे विसरून जातात त्यांच्याकडून काय अपेक्षा ठेवायची? अनेकजण तर मागे वळून पहात नाहीत. पण संतोष कुमार पटेल, D. S. P. पोलिस विभाग, मध्यप्रदेश यांच्यासारखेही हिरे असतात. पन्ना जिल्ह्यात जन्मलेला हा हिरा म्हणूनच अधिक चमकदार भासतो.

गांव का डीएसपी नावाने श्री. संतोष कुमार पटेल एक फेसबुक पेज चालवतात. याद्वारे विविध विषयांवर विडीओज बनवतात आणि प्रसारित करतात. तरुणांना मार्गदर्शन, समुपदेशन करतात!

— — सकारात्मक गोष्टीही घडत असतात समाजात… त्या आपल्या दृष्टीस पडाव्यात म्हणून ही कहाणी सांगितली. तुम्हांलाही असे काही ठाऊक असल्यास लिहा.

जय हिंद.

© श्री संभाजी बबन गायके.

न-हे, पुणे,  मो 9881298260

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /मंजुषा मुळे/गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ मला समजलेली संत तुकारामांची गाथा… भाग – १७ ☆ सुश्री अरुणा मुल्हेरकर ☆

सुश्री अरुणा मुल्हेरकर

? विविधा ?

☆ मला समजलेली संत तुकारामांची गाथा… भाग – १७ ☆ सुश्री अरुणा मुल्हेरकर ☆

सत्संग-सज्जन प्रशंसा

परमेश्वर प्राप्तीसाठी नामस्मरण, भक्ती, सेवाभाव याबरोबरच सत्संग या गोष्टीला तितकेच महत्त्व दिल्याचे आपल्याला गाथेतील  अभंगांतून दिसून येते. उच्च समजल्या जाणाऱ्या ब्राह्मण वर्गातील काही  मंडळींकडून तुकाराम महाराजांना अतिशय त्रास दिला जात होता. आम्ही वेद पंडित, शास्त्राचा अभ्यास केलेले, म्हणून आम्हीच अध्यात्माचे जाणकार असे समजून जे समाजातील खालच्या वर्गाचे समजणाऱ्या लोकांना फार पीडा देत असत अशा पाखंडी वर्गावर तुकाराम महाराजांनी त्यांच्या अभंगातून चांगलेच ताशेरे मारले आहेत.

ब्राह्मण असो की वैश्य असो अथवा शूद्र, संत सज्जन कोणाला म्हणावे हे सांगताना तुकाराम महाराज म्हणतात,

हिरा ठेविता ऐरणी/ वाचे मारिता जो घणी /

 तोची मोल यावे खरा/ करणीचा होय चुरा//

 मोहरा तोची अंगे/ सूत न जळे ज्याचे संगे/

 तुका म्हणे तोचि संत/ सोसो जगाचे आघात//

संत कसे असतात तर, जो हिरा ऐरणीवर ठेवून मोठ्या हातोड्याने त्याच्यावर घाव घातला तरी फुटत नाही. तोच हिरा

मौल्यवान आहे दुसरे इतर बनावट काचेचे तुकडे असतात कारण ते घाव घालताच त्यांचा चुरा होतो. ज्याला सूत गुंडाळून अग्नीत टाकले असता सूत जळत नाही तोच खरा मोहरा होय. त्याचप्रमाणे जो जगाने दिलेले सर्व प्रकारचे उपद्रव शांतपणे सहन करतो त्याला संत म्हणावे.

ते संतांचा महिमा वर्णन करतात.

 सकळ चिंतामणी शरीर/ जरी जाय अहंकार समूळ आशा/

 निंदा हिंसा नाही कपट देह बुद्धी/ निर्मळ स्फटिक जसा.//

 मोक्षाचे तीर्थ न लगे वाराणसी/ येती तया पासी अवघे जन//

 तीर्थासी तीर्थ झाला तोची एक/ मोक्ष तेणे दर्शने//

 मन शुद्ध तया काय करीसी माळा/

 मंडित सकळा भूषणासी//

 हरीच्या गुणे गर्जताती सदा/

 आनंद तया मानसी//

 तन मन धन दिले पुरुषोत्तम/ आशा नाही कवणाची//

 तुका म्हणे तो परीसाहुनी आगळा/

 काय महिमा वर्णू त्याचा//

या अभंगात तुकारामांनी संतांची लक्षणे सांगितली आहेत. चित्त शुद्ध असलेल्या संतांबद्दल तुकाराम महाराज गौरवाने बोलत आहेत की ज्याचा अहंकार गेला  आहे, निंदा, हिंसा, कपट, देह बुद्धी याचा वास त्यांच्यात नाही तोच स्फटिकासारखा निर्मळ आहे, त्याचे सर्व शरीर चिंतामणीच आहे. मोक्ष देणारे तीर्थ काशी, तिची त्याला जरुरी नाही. कारण सर्व तीर्थांना पावन करणारा संत हाच तीर्थस्थान झालेला आहे. सर्व जग अशा पुरुषापाशीच येते. याच्या दर्शनानेच मोक्षाचा लाभ होतो. ज्याचे मन शुद्ध झाले आहे त्याला जपमाळेसारख्या बाह्य चिन्हांची काहीही जरुरी राहिलेली नाही. मन शुद्ध असल्यानेच तो सर्व भूषणांनी मंडित झालेला आहे. जे हरीचे गुणगान करत असतात ते निरंतर आनंदातच असतात.त्यांनी स्वतःला पुरुषोत्तमाच्या ठायी अर्पण केले आहे आणि जो कोणावरही आशा ठेवत नाही तो परिसापेक्षाही श्रेष्ठ आहे. त्याचा महिमा शब्दात वर्णन करता येत नाही. संतांच्या दर्शनाने तापत्रयांचा नाश होऊन विश्रांती मिळते.

 

 शुद्ध बीजापोटी/ फळे रसाळ गोमटी/

 मुखी अमृताची वाणी/ देह देवाचे करणी//

 सर्वांग निर्मळ/ चित्त जैसे गंगाजळ/

 तुका म्हणे जाती/ ताप दर्शनी विश्रांती

 

बीज शुद्ध असले की त्यातून उगवणारी फळे रसाळ आणि गोडच असतात, असं सांगून संत तुकाराम पुढे म्हणतात की ज्याच्या मुखात अमृततुल्य गोड शब्द आहेत आणि ज्याचा देह देवकार्यासाठी वापरला जात आहे, ज्याचे चित्त गंगाजळाप्रमाणे पवित्र आहे त्याच्या दर्शनाने त्रिविध ताप हरण होऊन चित्ताला विश्रांती मिळते.

 सोनियाचे ताट क्षीरीने भरिले/

 भक्षावया दिले श्वानालागी//

 मुक्ताफळ हार खराशी घातला/

 कस्तुरी सुकराला चोजविली//*

 वेद पारायण बधिरा सांगे ज्ञान/

 तयाची ते खूण काय जाणे//

 तुका म्हणे ज्याचे तोची एक जाणे/

 भक्तीचे महिमान साधू जाणे//

एक संत साधूच असा आहे की जो भक्तीचा महिमा जाणतो. सामान्यांना हे पटवून देण्यासाठी तुकाराम महाराज या अभंगात रोजच्या जीवनातील काही उदाहरणे देतात.

सोन्याच्या पात्रात खीर भरून ती कुत्र्याला दिली तर त्याचा काय उपयोग? त्याचप्रमाणे गाढवाच्या गळ्यात मोत्याचा हार घातला किंवा डुकराच्या नाकाला कस्तुरी लावली

तर त्याचा महिमा त्यांना कळणार आहे का? एखाद्या बहिर्‍याला(अज्ञानी) माणसाला वेदाचे ज्ञान कितीही देण्याचा प्रयत्न केला तरी ते त्याच्या बुद्धीला समजणार आहे का? जे खरे वर्म आहे ते ज्याचा तोच जाणू शकतो. याच कारणास्तव संतांची संगती धरावी असे तुकाराम महाराजांचे सांगणे आहे.

तुकाराम महाराजांना वैष्णवांचे दास होण्याची तळमळ लागली आहे. कारण ते म्हणतात.

 ते माझे सोयरे सज्जन सांगाती/

 पाय आठवीती विठोबाचे//

 येरा मानविधी पाळणा पुरते/

 देवाची ती भुते म्हणोनिया//

 सर्व भावे जालो वैष्णवांचा दास/

 करीन त्यांची आस उच्छिष्ठाची//

 तुका म्हणे जैसे आवडती हरिदास/

 तैसी नाही आस आणिकांची//

तुकाराम महाराजांच्या मनात हरिदासांविषयी अत्यंत आदर आहे. जे पांडुरंगाच्या चरणांचे चिंतन करतात ते सज्जन माझे सोयरे आहेत असे ते म्हणतात.

बाकीच्यांना मी फक्त विधीपालनापुरते आदराने वागवतो कारण सर्व भूतमात्र देवाच्याच रूपाचे असतात. काया, वाचा, मनाने मात्र तुकाराम महाराज वैष्णवांचे दास आहेत. त्यांच्या उच्छिष्टाची महाराज आशा धरतात. त्यांना हरिदास जितके आवडतात तितके इतर कोणीही आवडत नाही. या अभंगात पर्यायाने सज्जनांची संगती चांगली हे सांगण्याचा महाराजांचा आटोकाट प्रयत्न आहे.

संतांची महती सांगणारा हा आणखी एक अभंग आपण पाहूया.

 काय वाणू आता न पुरे हे वाणी/

 मस्तक चरणी ठेवीतसे//

संत महात्म्य वर्णन करताना महाराजांची वाणी अपुरी पडते. त्यांच्या चरणावर मस्तक ठेवून ते म्हणतात,

 थोरीव सांडली आपुली परिसे/

 नेणे सिवो कैसे लोखंडासी//

 जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती/

 देह कष्टविति पर उपकारे//

 भुतांची दया हे भांडवल संता/

 आपुली ममता नाही देही//

 तुका म्हणे सुख पराविया सुखे/

 अमृत हे मुखे स्त्रवतसे//

लोखंड अति हीन आहे, त्याला मी कसा स्पर्श करू? असे मनात न आणता परीस त्याचे सोने करतो, त्याचप्रमाणे संतांनी माझ्या सारख्या हीनाचा स्वीकार केला आहे. संतांचे अवतार जगाच्या कल्याणा करताच असतात, ते आपला देह परोपकार करण्यासाठी कष्टवितात. सर्वांवर दया करणे, हे संतांचे स्वाभाविक भांडवल आहे व त्यांना स्वतःच्या देहाची ममता नसते.

ते संत लोकांच्या सुखामुळेच सुखी होतात आणि त्यांचे बोलणे अमृता सारखे मधुर असते. हरीच्या नामामृताचा ओघच त्यांच्या वाणी वाटे वाहत असतो.

पुढील भागात सज्जन प्रशंसे विषयी आणखी काही अभंगांचा आपण विचार करू.

क्रमशः… १६ 

© सुश्री अरुणा मुल्हेरकर 

डेट्राॅईट (मिशिगन) यू.एस्.ए.

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – प्रतिमेच्या पलिकडले ☆ # हमारा बजाज… # ☆ श्री नंदकुमार पंडित वडेर ☆

श्री नंदकुमार पंडित वडेर

? प्रतिमेच्या पलिकडले ?

☆ # हमारा बजाज… # ☆ श्री नंदकुमार पंडित वडेर 

आमच्या लहानपणी.. म्हणजे साठी च्या दशकात… चैत्र संपता संपता आणि वैशाखाची ओपनिंग सुरू झाली की फारतर जेष्ठ अर्धा अधिका पर्यंत… मराठी महिन्याच्यां गोंधळात न पडता सरळ इंग्रजी मंथचा विचार केला तर मार्च एंड पासून ते जून हाफ पर्यंत उन्हाळ्याचा सिझन सुरू असायचा… त्यावेळी सगळे ऋतू आपल्या वेळा काटेकोरपणाने पाळत असत… इतकचं काय माणसं, संस्था आस्थापना, शाळा, महाविद्यालये, रेल्वे, बस, विमानं इ इ. देखिल आपल्या वर्षभराच्या एकदा आखून दिलेल्या वेळापत्रकानुसार चालत असतं… वार्षिक परिक्षेचे पीर एप्रिलच्या मध्याला एकदा पाण्यात पडले कि सगळी शाळकरी मुलांचा जथ्था आपापल्या पालकांसह उन्हाळी सुट्टीसाठी म्हणून गावाकडे जायचा… शहरातील उन्हाळ्यापेक्षा गावात सौम्य आणि अधिक गारवा तसेच आंबा, काजू, फणस, जांभूळ चा मनसोक्त पाहुणचाराचा आस्वाद आनंद लुटून झाला कि मृगाची पावसाची पहिली सर पडायचा अवकाश कि सगळे आपल्या शहरात परतायचे… तेव्हा त्या दोन तीन महिन्यात इकडे सिलिंग फॅन हुप्प होऊन बसायचा… ते ए. सी. , कुलर वगैरे श्रीमंती सिंम्बाल चे फॅड अद्याप मध्यमवर्गीय कुटुंबात अवतरलेले नव्हते… आणि सिलिंग फॅन मात्र शहरात घराघरातून वर्षभर तिन त्रिकाळ घुमत असायचा… पर्यावरणाचा समतोल साधला गेल्याने उन्हाळी तापमान देखील आपला ठरलेल्या पाऱ्यापेक्षा कधी जास्त होतच नसे… तर सांगत होतो कि तेव्हा सिलिंग फॅन हि एकमेव घरटी गरज होती आणि टेबल फॅन खिशात खुळखळणाऱ्या जास्तीच्या पैशाची चैन समजली जायची… जिथे हम दो और हमारे दो चा मामला तिथे सिलिंग वरचा एकुलता एक हाॅल मधला नि बेडरूम मधला हमारा बजाज आपलं गारेगार वारं फिरवायचा… पण जिथं टिचभर जागेत मणभर माणसं असायची तेव्हा हा चैन म्हणून नावं ठेवलेला टेबल फॅन उपयोगात आणला जायचा.. प्रत्येकाच्या सोयीनुसार कोपऱ्यात फिरता वा खडा ठेवून वारं फिरवायचा… स्पीड ची बटनं चार असली तरी वारं भन्नाट देत असे… पण या टेबल फॅन चा उपयोग मात्र त्या उन्हाळ्यापुरता मर्यादित असे… त्यानंतर तो अडगळीत फळीवर (लाॅफ्टवर) त्याला गवसणी घालून ठेवला जाई तो परत पुढच्या उन्हाळ्यातच खाली उतरे… असं दोन दशके पुढची गेली आणि पुढे पुढे सगळा माहोलच बदलत गेला… त्याला काय होतयं या विचाराने बुद्धीला मांद चढले आणि माणसांची विचाराची दिशा विकृत झाली… त्याचा विपरीत परिणाम निर्सगावर झाला आणि तो देखील माणसासारखाच रंग बदलू लागला.. त्याच्या दैनंदिन वेळापत्रकाचलाच त्याने न जुमानता आपल्या मनाला स्वैर स्वातंत्र्य दिले… सगळे ऋतूंची मनमौजी सुरू झाली… कुणीही उठावं कधीही यावं आपल्याला हवं तसं वागावं.. राहावं, ओरबाडावं, नासधूस करावं नाहीतर हुलकावणी देत राहून तोंडच दाखवायचं नाही… आणि माणसालाच वेठीला धरून त्यालाच जाब विचारायचा… सर्व काही तुझ्या ताब्यात आहे याचा फुकाचा गर्व आहे ना तुला मग दाखव कि वेळेवर हवा तेव्हढा पाऊस, थंडी आणि उन्हाळा आणून… आहे का तुझा निर्सगावर अंकुश तुझा… लावतोस का शिस्त मला… तुला काय वाटलं हमारा बजाज सारखा बटणाच्या कळीवर चालू बंद करून हुकमत आमच्या वर मिळवता येईल काय… अरे तुमचा तो हमारा बजाज देखील काहीवेळा चालता चालता बंद पडतो.. मान टाकतो आणि कशी तुमची ऐन गरजेच्या वेळी काशी करून जातो… तेव्हा तुमची कशी होते चिडचिड… अगदी त्याच तालावर माझ्या या बेताल वागण्यानं देखील तुमच्याच बेजबाबदार पणाने माझ्याशी वागणूकीचा परिणाम तुम्हाला भोगायला लावण्याची किंमत मोजून घेत असतो… तुम्ही काय रे हमारा बजाज म्हणून त्या टेबल फॅन चेच गोडवे गात बसता… नि आम्हाला विसरता… ये हमने आपको करारा जवाब दिया है… तो बाजारातून जेव्हा हमारा बजाज नवा कोरा घरी घेऊन येता तेव्हा त्याच्या नवलाई पुढे सगळे घरदारनं घेरुन बसते आणि तो एकशे ऐंशीच्या कोनात फिरणारा टेबल फॅन मात्र अरे मला जरा मोकळीक द्याल तर मी हवा पसरवेन… कुणी आगाऊ कारटं त्या पात्यावर पेन्सिल, कागद धरून आवाजाची गंमत लुटत असतं.. नि माझ्या गतीला अवरोध झाल्याने मग माझी मतीच खुंटते नि कुठेतरी खरखर करणारा कानाला सहन न होणारा आवाज माझ्याकडून निघाला कि… अरे याला वापरून दहा वर्षे झाली म्हणजे याची गॅरंटी संपली आता त्याला भंगारात मोडीत घालून दूसरा नवा आणायला हवा… असं म्हणून पुन्हा तुम्ही नवा हमारा बजाजच आणता… आमच्या सारखे कैक बाजारात आले आणि गेले पण आमच्या सारखे आम्हीच कायम टिकून राहिलोय… हे तुमचं नि हमारा बजाज चं जन्मोजन्मीचं नातं असं अबाधित राहिले आहे.. जिंदगी के साथ भी और जिंदगी के बाद भी… ठंडा ठंडा कुल कुल..

©  श्री नंदकुमार इंदिरा पंडित वडेर

विश्रामबाग, सांगली

मोबाईल-99209 78470 ईमेल –nandkumarpwader@gmail.com

≈ संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ सोलापुरातील ‘आवाज की दुनिया’  ☆ शीला पतकी ☆

शीला पतकी 

? मनमंजुषेतून ?

☆ सोलापुरातील ‘आवाज की दुनिया’ ☆ शीला पतकी 

सोलापूरची खरी ओळख गिरणगाव म्हणून होती. आता एकही गिरणी शिल्लक नाही हा भाग वेगळा पण गावाची सुरुवातच मुळी गिरणीच्या वाजणाऱ्या भोंग्यान व्हायची. जुनी गिरणी, लक्ष्मी विष्णू, जाम मिल, फुटाणे गिरणी म्हणून पण एक होती. अशा गिरण्यांच्या भोंग्याच्या आवाजाने गावाला जाग येत असे. गिरणीत पाळी बदलली की भोंगा वाजायचा तोच अख्या गावाला घड्याळाच टाइमिंग दाखवायचा. पाचच्या भोंग्यावर पाणी यायचं माणसं उठायची… पाण्याचा आवाज… पाण्याच्या भांड्यांचा आवाज… मग कोणाची आदळ आपट… आणि सोलापुरातील खास विषय म्हणजे नळावरची भांडण…! सरकारी नळ असायचे. त्या नळावर अख्या गल्लीची गर्दी… वाड्यातनही अनेक बिर्हाडामध्ये एखादा नळ… तसं तर पाणी दोन वेळा यायचं… पण वाड्यात 100- 100 माणसं. वरच्या मजल्या वरील लोकांना जिन्यावरून पाण्याच्या घागरी नेऊन पाणी भरावे लागे मोटर वगैरे नव्हत्या.

लाईट जेमतेम संध्याकाळ झाल्यावर तेसुद्धा रात्री नऊ पर्यंत चालू असे. त्यानंतर सगळ्या वाड्याचा लाईट बंद.! अभ्यास करणारी पोरं मग कंदीलावर अभ्यास करत असत अरे आमका पोरगा कंदीलावर अभ्यास करून मोठा झाला… असं काही नाही सगळीच पोर कंदीलावर अभ्यास करत होती. मुन्सिपालटीच्या दिव्यावर म्हणावं तर त्याच्यात संध्याकाळी एक माणूस तेल घालून जायचा त्या तेलावर तो दिवा किती वेळ जळणार मग तेही दिवे मालवून जायचे. अशी ही दिव्याची दिव्य कथा! त्यामुळे सकाळी नळावर भांडण नाही झाल असा दिवस नव्हता अर्थात ती भांडण तात्कालीक असायची. त्याचवेळी संडासला रांगा लागलेल्या. तीन-चार बिराडात एक बाथरूम कॉमन… सगळ्यांची आंघोळीची घाई… भांड्याचा खणखणाट संपेपर्यंत… धुण्याचा धपधपात चालू व्हायचा…

त्यानंतर बटर विकणारी माणसं ओरडत यायची सकाळची ही चहा बटरची सोय झाली की मग एखादा उसsssळ असे ओरडत यायचा. आम्ही मुस्लिम गल्लीत राहत असल्यामुळे म्हणजे काळी मशीद भागात… सहा वाजताच गल्लीत असलेले थोबडे आणि अण्णाप्पा व्हट्टेते चे दुकान उघडून ती मंडळी तयार असायची. थोबड्यांचे दुकान आमच्या वाड्याच्या खालीच असल्यामुळे दुकानाचा एक दरवाजा वाड्याच्या बाहेर आणि दुसरा दरवाजा वाड्यात असा उघडत असे. त्याच्या शेजारीच त्यांच्या दोन खोल्या कधी कधी थोबडे मामाला मदत करायला आम्ही वाड्यातली पोरं जात असू कारण सकाळी गडबड असायची ना सकाळच गिऱ्हाईक आणि वस्तू ठरलेल्या… “मामा दोन बाई छाप दो(म्हणजे चहा पुड्या), एकाने की मसूर डाळ, एक आने का तेल, दो पैसे के फल्या म्हणजे भाजक्या शेंगा, दो पैसे की शक्कर, दो पैसे की मसाला पुडी और चार आणे का जवारी का पीठ”… सगळी यादी थोबडे मामांना तोंडपाठ असायची त्यांचे हात वेगाने काम करायचे मदतीला आम्ही असायचोच एवढ्या कमी पैशात त्या गरीब माणसाची सकाळ भागत होती… हे मला आता विचार करताना लक्षात येतं.!

ही लगबग संपेपर्यंत वाडा थोडा शांत झालेला असायचा एखाद्या घरचा सकाळी सहा वाजता बॅटरीवर लावलेला सकाळचा रेडिओ त्याच्यामुळे अख्ख्या वाड्याची सुरुवात बिस्मिल्ला खानच्या शहानाईने व्हायची… सुधा नरवणे बातम्या देत आहेत… या आवाजाने घरातल्या आया पोरा सोरांना उठायच्या, “उठा रे सुधाताई आल्या सात वाजले” अर्थात आळशी राहिलेल गदळ त्यावेळेला उठायच. चहाचे सुगंध आणि कपबशाच्या मधुर आवाजांचा किणकिणाटात उषःकाल संपलेला असायचा आणि घराघरातून स्टोव्हचे शेगड्यांचे आवाज यायचे. खमंग फोडण्याचे वास तुरीची डाळ आणि भात शिजल्याचा वेगळाच वास ती भाताची रटरट. तो फोडणीचा तडतडाट आणि खमंग वास… आसमंतात भरून राहायचा.. आणि गंध आणि नाद यांच्या आवाजाची जुगलबंदी कानाला सुख द्यायची. पाठोपाठ धपाधपा भाकरी बडवल्याचा आवाज..

कुठेतरी पोरांच पाठांतर. कविता वाचन कुठेतरी पूजेच्या घंटा.. कुठेतरी आरती.. आणि पोरग अभ्यास करीत नाही ऐकत नाही रट्टे खाऊन ओरडण्याचे व्रात्य पोरांचे आवाज. वाड्याच्या प्रत्येक घरात वेगवेगळे काम चालू असायचे. मग शाळेला जायची गडबड पोर सर्व जेवण करून शाळेला निघाली कि अकरा वाजता सुधा जोशी.. कामगार सभेच्या कार्यक्रमाला हजर..! पोरं शाळेला पळाली कि आया जरा मुक्तपणे… दत्त दिगंबर दैवत माझे किंवा असावे घर ते आपले छान किंवा कौसल्याचा राम बाई अशा माणिक बाईंच्या आवाजात गुंगून जायच्या. भाजी फारशी दारावर येत नसे कारण आमच्या गल्लीतच भाजीचे छोटे मार्केट होतं कधीतरी एखादा शेतकरी बैलगाडीवर मेथीच्या पेंड्या घेऊन येत असे आणि दहा नव्या पैशाला एक पेंडी याप्रमाणे तो मेथी विकून गाडी रिकामी करूनच जायचा. त्याचा आवाजाच भारी… “महागाईत सस्ताईची कमाल 10 पैसे 10 पैसे “असे मोठ्या आवाजात ओरडून तो भाजी विकायचा. मध्येच दहीवाला दहीsss म्हणून ओरडून जायचाआणि सकाळचे आवाज संपायचे.

पुरुष मंडळी गिरणीमध्ये.. पोरं शाळेत.. मग बायका मंडळींचच राज्य… त्या बिचाऱ्या सगळ आवरून विश्रांती घेत तोवर सकाळच्या शाळेत गेलेली पोरं परत यायची त्यांची उस्तवारी करायची… थोड्या आडव्या पडल्या की त्यांचं दुपारी निवडण टिपण सुरू कारण त्या काळातल येणार धान्य निवडलेलं नसायचं… तांदळात गारेचे खडे असायचे… ज्वारी गव्हात खडे असायचे… मोहरी तर विचारूच नका.! आता कसं सगळं स्वच्छ निवडलेले मिळते, अगदी रेडी टू कुक! तेव्हा फक्त घरातली बाई रेडी टू कुक असायची.

दुपारचे आवाज वेगळेच असायचे दुपारी बर्फ गोळा.. बुड्डी का बाल… काळी मैना… ए कुल्फी एक डहाळे किंवा काय घोंगडीला रेवड भरायची कायssss असे आवाज करीत तांबड पागोटे आणि खांद्यावर घोंगड आणि हातात लोकरीची टकळी फिरवत रेवड वाला यायचा यायचा(रेवड म्हणजे घोंगड्याच्या टोकाच्या बाजूला घातलेली वीण त्यामुळे त्याचं धागे सुटू नयेत)… त्याबरोबर बोहारणीचा एक आवाज असायचा “काय हाय का जुने कापडं… ” असा टिपेला गेलेला आवाज असायचा मग बाया बापड्यांची तिच्याभोवती गर्दी एक तास मनोरंजन…! जुन्या कपड्यावर केलेल्या खरेदीचा आनंद! त्याच वेळेला खाली.. दिल्ली का लाल किल्ला देखो… आग्रे का ताजमहाल देखो.. असे टाळाचा नाद करीत सिनेमा दाखवणारा माणूस यायचा त्याच्या त्या तिपाईवर एक यंत्र असायचं.. वरच्या बाजूला एक बाहुली… त्याने दोर्या आवळल्या कि ती बाहुली नाचायची समोरच्या डब्याचे झाकण काढून पोरं सिनेमा बघायची… सिनेमा कसला एका पैशात चार-पाच चित्र दाखवायचा मजा होती…

पण चार वाजता गिरणीचा भोंगा व्हायचा कामाला गेलेली माणसं परत येईतो गाव हळूहळू थकत गेलेल असायचं! घरोघरी कंदीलाच्या काचा पुसून संध्याकाळची तयारी व्हायची तुळशी वृंदावनाजवळ दिवे लावायचे. काही घरात आरती व्हायची… काही घरात शुभंकरोती.. वाड्यात खेळणाऱ्या पोरांचे आवाज हळूहळू बंद व्हायचे! रस्त्यावरती मंद प्रकाश… प्रकाशाचा झगमगाट नसल्यामुळे सारा दिवस मिटत आल्यासारखा भासायचा. तोच एका लाकडी ट्रेमध्ये आलेपाक च्या वड्या आणि ढणढण जळणारा दिवा घेऊन ए आले पाक वाला आलेपा ssssकअसे ओरडत एक आलेपाक वाला यायचा आणि हलकेच तो त्या धुरात नाहीसा व्हायचा. तो शेवटचा विक्रेता. बुधवार असेल तर वाड्यातल्या एकमेव कुठल्यातरी रेडिओवर बिनाका गीतमाला ऐकायला मात्र चढाओढ असायची. कुठलं गाणं कुठल्या पायदान वर यायचे याची चर्चा असायची त्या एकमेव घराला.. ” काकू रेडिओचा आवाज थोडा मोठा ठेवा ना “… अशी प्रेमळ सूचनाही केली जायची. साडेआठ वाजताच मशिदीतली अजान व्हायची मग नमाज… नऊ पर्यंत सगळे खाऊन पिऊन अंथरुणावर जायचे नऊच्या दरम्यान सगळे दिवे मालवले जायचे कुठेतरी एखाद्या घरात चिमणी किंवा कंदील लागलेला असायचा कुठल्यातरी घरातून लहान लेकराला झोपवण्यासाठीचा अंगाईचा आवाज, जवळच्या मठातून टाळाचे, भजनाचे, आवाज यायचे.! रस्त्यावरची रहदारी केव्हाच बंद झालेली असायची. रिक्षा गावात नव्हत्या एखाद दुसरी मोटार,… चार दोन टांगे त्यांच्या घोड्याचा टापाचा आवाज… सायकलच्या घंटेची टिंग टिंग… या पलीकडे रस्त्यावर आवाज नव्हते! मग सारा शहर शांत व्हायचं आणि आनंदाने निद्रा देवीच्या आधीन व्हायचे… रात्री क्वचित रस्त्यावर एखाद्या दारुड्याची वेडी वाकडी चाल आणि बरळणं ऐकू यायचं एखाद्या घरात नवरा बायकोला बदडून काढायचा आणि तीही त्याला ठोकायची कारण तो त्यानंतर दारू पिऊन आलेला असायचा एवढे गोड आवाज संपले की दिवस संपला…!

– – – आवाज की दुनिया पूर्णपणे निद्रिस्त व्हायची गिरणगावची सारी दारिद्र्य दुःख दैना त्या परमेश्वराला हात जोडून सांगितली की तो दिवस संपवून जाई आणि सार शहर उद्याच्या आशेच्या किरणाची… पक्षांच्या चिवचिवाटाचीआणि पुनः त्याच आवाजाची वाट पाहत शांत झोपी जायचं आणि मधेच कधीतरी एखाद्या कुत्र्याच केकाटणे चालू राहायचं… रात्रीच्या त्या निरव शांततेचा शेवट रात्री बारा वाजता गस्त घालायला येणाऱ्या रामोशाच्या आवाजाने व्हायचा. तो ओरडायचा जागते रहो ssssजागते रहो ssssआणि गंमत म्हणजे त्या वेळेला सार शहर निद्रा देवीच्या आधीन गेलेल असायचं…!

© सुश्री शीला पतकी

माजी मुख्याध्यापिका, सेवासदन प्रशाला सोलापूर 

मो 8805850279

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ ”How are you??” ☆ संध्या बेडेकर ☆

संध्या बेडेकर

? मनमंजुषेतून ?

☆ “How are you??” ☆ संध्या बेडेकर ☆

“How are you??“

किती साधा आणि अगदी सहज विचारला जाणारा प्रश्न?

  • कशा आहात?
  • काय म्हणताय?

 याच अर्थाचे अनेक प्रश्न.

कोणी ओळखीचे भेटल्यावर सहजच विचारल्या जाणारा पहिला प्रश्न. गप्पांच्या सुरवातीचा प्रश्न…

त्याला साजेशी उत्तर…

  • अगदी मस्त,
  • मजेत 
  • I am fine. ,
  • I am doing good,

अशी, generally उत्तर आपल्याला ऐकायला मिळतात. चेहर्यावर हलकेसे स्मित पण दिसते. तरच तर उत्तर आणि चेहर्यावरचे भाव मॅच होतील. नाही का?

काल माझ्या मैत्रीणीच्या आईला आजींना केअर सेंटर मध्ये भेटायला गेले.

Wheel chair वर बसवून एका नर्सने त्यांना लिफ्टमधून खाली हाॅलमध्ये आणले होते. समोर वाहता रस्ता आहे, त्यामुळे संध्याकाळचा वेळेस पेशंटस येथे आणतात. दिवसभर खोलीत गेल्यामुळे त्यांनाही बाहेर चांगले वाटते.

इतर पेशेंट्ना भेटायला येणार्यांशी पण गप्पा होतात.

तेथेच आमच्या सोसायटीच्या Mrs Sharma retired english प्रोफेसर येथे admit आहेत हे मला माहित होत. त्या समोरच दिसल्या. मी विचारल,…

How are you Mam?

Oh! I am fine, doing good, All the doctors and nurses are taking very good care of us. May be in a month or two, I will be kack to my home.

मी त्यांच्या साठी आणलेली फळ त्यांना दिली आणि तेथेच बेंचवर बसून आजीं बरोबर गप्पा मारत होते.

आजींना विचारल? कशा आहात?

आजी हळुच हसल्या. म्हणाल्या…

अग! बघ सध्या हे अस आहे. परावलंबी जीवन जगण चालू आहे. कोणीतरी बसवणार, उठवणार, घेऊन येणार, घेऊन जाणार.

अग! पण यालाही नशीब लागत बर. आता या परिस्थितीत दुसरा उपाय नव्हताच. घरी एकटी राहणे शक्य नव्हतेच. बर आता अनघाचा (मुलीचा) विचार करणे पण आवश्यक आहे. बरेच उपाय/ पर्याय विचार करून, आमलात आणून झाले. मला फक्त माझाच विचार करून चालणार नव्हत. सारासार विचार करून हे option मला पटल. अग! आता केंव्हा आणि कधी डोॅक्टर ची गरज पडेल सांगता येत नाही. पाय अधु झाल्यापासून मला मदतीची गरज लागतेच. आयुष्यात परिस्थितीप्रमाणे नेहमीच तडजोड करत आलोय. नाही का? ही पण अशीच एक तडजोड आहे बघ.

अनघा चा विचार करण ही गरजेचेच आहे तिच्या जीवाची घालमेल कळते मला.

तिची मुल आता 10, वी 12 ला आहेत. तिची नोकरी, घर, मुल सर्वच बघायच. मीच हा option google वर search केला. आणि मी येथे रहायला आले.

आजी म्हणाल्या…

चल मी तुला माझी खोली दाखवते.

खोलीत एक writing table, एक लहान music system, पेन स्टंड, एक फोन holder, room freshner, coloured pencils, drawing book for seniors, family photo, देवाचा फोटो, मैत्रीणींचा गृप फोटो होता. काही पुस्तक ठेवली होती.

म्हणाल्या…

हा बघ माझा संसार. हा IPAD मी नवीन घेतला. सध्या मी on line गीता शिकतेय.

Thank God! पायात शक्ति राहीली नाही, पण डोक मात्र जागेवर आहे.

मला खूप कौतुक वाटल आजींच.

अग! शेजारच्या खोलीत माझ्याच वयाच्या सुमनताई आहेत. झोपूनच असतात. मी मधून मधून त्यांच्याजवळ जाऊन बसते. भजन म्हणते, एखादी गोष्ट वाचून दाखवते. माझा पण वेळ चांगला जातो.

बरोबर आहे…

खुश रहने के तरीके सोचने पडते है। तकलीफे तो खुदही हमें ढूंढ लेती हैं।

 तितक्यात अनघा आलीच. आईला छान भेटली, तिच्या डोक्यावरून हात फिरवला. जेवली का? झोप लागली का? थोडी विचारपूस झाली. दोन पुस्तक दिली.

अनघा मला म्हणाली झाल्या का गप्पा तुमच्या? अग! आईचे drawing book बघीतलेस का तू? अग! आमची आई म्हणजे चित्रकारच आहे बघ. काय सुंदर कलर्स भरले बघ.

क्षणभर आई मुलीच्या नात्याची अदलाबदल झाली की काय? असच वाटल मला. अनघाने आईच्या डोक्याला तेल लावल. माॅलीश केली. वेणी घातली. तिच्यासाठी आणलेल्या वस्तू जागेवर ठेवल्या. शेजारच्या सुमन काकूंना भेटून आली.

आजी म्हणाल्या,… अग! आता मुलांच्या परीक्षा जवळ आल्या आहेत, तिथे लक्ष दे. मी ठीक आहे. आणि फोनवर बोलू की..

थोड्या वेळाने आम्ही दोघी घरी यायला निघालो.

खाली Mrs Sharma ची मुलगी मिनी भेटली. Mrs Sharma तिला म्हणत होत्या, मला घरी घेऊन चल. मला नाही रहायच इथे.

बर! ठीक आहे. डोॅक्टर ने परमिशन दिली की जाऊ आपण घरी. मिनी म्हणाली.

अक्षरशः Mrs Sharma रडतच होत्या.

आम्ही तीघी बरोबरच बाहेर पडलो.

मी मिनी, अनघाच्या चेहर्यावरचे भाव निरखत होते, त्यांच्या मनातील घालमेल समजायचा प्रयत्न करत होते. एक पाय इथे थांब म्हणत होता तर दुसरा पाय घरांकडे जाण्याची घाई करत होता. तिथे नवरा मुल वाट बघत होती.

Past, Present आणि Future चा ताळमेळ बसवायचा त्यांचा प्रयत्न म्हणजे तारेवरची कसरतच. दोघींच्या मनात वेगळच विचार असतील. नाही का?

मिनी म्हणाली…  It is very difficult rather not possible to take care of her at home. 

अनघा म्हणाली,…

Old age is difficult. It totally depends on how they react / respond to it. 

खरय…

It is not bad things happen to good people, I think bad things hapen to everyone, It is the way they respond to situation / problem, make them good people. 

आता घरी गेल्यावर दोघी दुसर बटन on करून दुसरी जबाबदारी पूर्ण करणार.

आज अनघा आणि मिनी आपापल्या आयांचे आणि मुलांचे पालक आहेत. दोन्ही जबाबदार्या जाणून आहेत. प्रत्त्येकाच्या प्रवासात मदत करतायेत.

राहून राहून दोन्हीं आजींची 

How are you?

विचारल्यावर त्यांची उत्तरे मला आठवत होती.

आपली माणस दिसली की आवाज, मनातले भाव, उत्तर सगळच बदलत.

शारिरिक शक्तीपेक्षा मानसिक शक्ती / attitude महत्वाचा. येथे बाई- माणूस, शिकलेली – अशिक्षित याच काहीही देणघेण नसत.

हे प्रत्येकाची सहनशक्ती, समज, acceptance to reality यावर अवलंबून असत.

खरय…

The hardest walk in life is to walk alone. once you accept and understand the reality, it becomes easier. It makes you strong.  

© संध्या बेडेकर 

वारजे, पुणे.  

7507340231

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ ।। श्री नारद उवाच ।। – नारद भक्ति सूत्रे —सूत्र ७०, ७१, ७२, ७३. ☆ श्री संदीप रामचंद्र सुंकले ☆

श्री संदीप रामचंद्र सुंकले

? इंद्रधनुष्य ?

।। श्री नारद उवाच ।। – नारद भक्ति सूत्रे — सूत्र ७०, ७१, ७२, ७३. ☆ श्री संदीप रामचंद्र सुंकले 

।। श्री नारद उवाच ।। 

नारद भक्ति सूत्रे ७० – – 

तन्मया : ||७०||

 अर्थ : भक्त भगवंतमय झालेले असतात.

विवेचन: विभक्त नाही तो भक्त अशी भक्ताची व्याख्या केली जाते. इथे तन्मय असा उल्लेख आहे. साधना पूर्णत्वास गेली की भक्त आणि भगवंत यांच्यात काही भेद रहात नाही. अशा साधकाचे वर्णन भगवंत गीतेत करतात.

*”नाही तृष्णा भय क्रोध माझ्या सेवेत तन्मय|*

*झाले ज्ञान-तपे चोख अनेक मज पावले||”*

(गीताई ०४. १०)

संताना ना कोणापासून भय असते, तर कोणासाठी त्यांच्या मनात क्रोध असतो. त्यांच्या मनात फक्त त्या भगवंताबद्दल निरतिशय प्रेम असते. जणू भगवंतच त्यांच्या ह्रदयात विराजमान असतो. आपल्याला हनुमानाची गोष्ट ठाऊक आहे. वेळ आल्यावर हनुमानाने आपली छाती विदीर्ण करून राम आपल्या हृदयात असल्याचे दाखवून दिले होते. अशी सर्व मंडळी ही सामान्य साधकांसाठी भक्तीचे आदर्श आहेत, प्रमाण आहेत.

प्रभू श्रीरामाला हनुमंताला बक्षिस देण्याकरता एकही गोष्ट योग्य वाटली नाही. शेवटी त्याने हनुमंताला आलिंगन दिले आणि त्याचे कौतुक पुढील शब्दांत केले आहे.

रघुपति कीन्ही बहुत बड़ाई। तुम मम प्रिय भरतहि सम भाई।”

संत तुकाराम महाराज म्हणतात की साधना करता करता अशी वेळ आली की मला आता विठ्ठल माझा सोयरा वाटू लागला आहे. सोयरा अर्थात अगदी जवळचा.

ते एका अभंगात म्हणतात,

*”विठ्ठल सोयरा सज्जन सांगाती । विठ्ठल या चित्तीं बैसलासे ॥१॥ विठ्ठलें हें अंग व्यापिली ते काया । विठ्ठल हे छाया माझी मज ॥२॥ बैसला विठ्ठल जिव्हेचिया माथां । न वदे अन्यथा आन दुजें ॥३॥ सकळां इंद्रियां मन हे प्रधान । तें ही करी ध्यान विठोबाचें ॥४॥” तुका म्हणे या हो विठ्ठलासी आतां । नये विसंबतां माझें मज ॥५॥”*

(अभंग क्रमांक 497, सार्थ तुकाराम गाथा धार्मिक प्रकाशन संस्था)

 जय जय रघुवीर समर्थ

—–

भक्ति सूत्रे क्र. ७१ – 

*”मोदन्ते पितरो नृत्यन्ति देवताः सनाथा चेयं भूर्भवति ||७१||”*

अर्थसिद्ध भक्ताच्या माता, पिता व पूर्वजांना आनंद होतो. देव देवता आनंदाने नृत्य करतात आणि पृथ्वीला रक्षणकर्ता मिळून ती सनाथ होते.  

विवेचनदैनंदिन व्यवहारात एखादा मनुष्य जर श्रीमंत झाला, मोठा उद्योगपती झाला तर त्याचे कूळ तर उद्धरतेच, तसेच त्याच्या कर्तृत्वामुळे अनेक लोकांना रोजगार मिळत असतो.

परमार्थातील अंतिम पायरी म्हणजे भक्त आणि भगवंताचे एकरूप होणे. असे पूर्णत्व प्राप्त करणारे तसे मोजकेच असतात, पण ते असतात यात काही शंका नाही. भारतमातेच्या अशी अनेक नररत्ने जन्मास आली की ज्यांनी भगवंताची प्राप्ती करून घेतील आणि ही परंपरा अखंड राहील यात शंका असण्याचे कारण नाही.

एक गोष्ट आपण इथे लक्षात घेतली पाहिजे की जेव्हा एखाद्या जडजीवाला नरदेह प्राप्त होतो, तेव्हा भगवंताला सर्वात जास्त आनंद होतो कारण त्याला वाटते की आता मी याला नरदेह दिला आहे, तर आता हा साधना करून माझी (अर्थात भगवंताची) प्राप्ती करून घेईल, पण प्रत्यक्षात मात्र लाखो करोडो मध्ये एखादा जीव देवत्वापर्यंत पोचतो. मग ज्याप्रमाणे ऑलिंपिक पदक मिळविल्यावर ज्याप्रमाणे त्या देशातील सर्वांना आपल्या घरी दसऱ्याच्या दिवशी दिवाळी आल्यासारखे वाटतेज तसे साधकाच्या नातेवाईकांना, घरच्या लोकांना, पितरांना नव्हे तर देवदेवतांना ही तितकाच उत्कट आनंद होतो असे नारद मुनी आपल्याला सांगत आहेत.

अशा साधकाचे वर्णन संत तुकाराम महाराज आपल्या पुढील अभंगात करतात… 

*”निर्वैर होणें साधनाचें मूळ । येर ते विल्हाळ सांडीमांडी ॥१॥ नाहीं चालों येत सोंगसंपादणी । निवडे अवसानीं शुद्धाशुद्ध ॥२॥ त्यागा नांव तरी निर्वीषयवासना । कार्‍या कारणां पुरता विधि ॥३॥ तुका म्हणे राहे चिंतनीं आवडी । येणें नांवें जोडी सत्यत्वेंसी ॥४॥”*

साधकाच्या अंतरात देवत्व प्रगट झाले की तो सिद्ध होतो. देहाने मनुष्य दिसत असला तरी तो भगवंत झालेला असतो. बाहेरून त्या संताचा व्यवहार कदाचित अतिसामान्य असेल, पण अंतरात मात्र त्याचे अनुसंधान पक्के असते.

त्याच्या नजरेत सर्वजण समान असतात. ते अवतरण करतात, ते आपल्या सारख्या सामान्य जनांचा उद्धार करण्यासाठी. पूज्य ब्रम्हानंद महाराज म्हणायचे की दोन रुपयाचे तिकीट काढले की गोंदवले येथे सगुण ब्रह्म पाहायला मिळायचे. अशा संतांमुळे पृथ्वीवरील पाप नष्ट होते, पृथ्वी सनाथ होते.

जय जय रघुवीर समर्थ

—–

भक्ति सूत्रे क्र. ७२, ७३ – – 

 *”नास्ति तेषु जाति विद्यारूपकुलधनक्रियादि भेदः ॥७२॥”*

*”यतस्तदीय: ||७३||”*

अर्थश्रेष्ठ भक्तांमध्ये जातपात, विद्या (शिक्षण), रूप, कुळ, पैसा, करत असलेले काम इत्यादींवर आधारलेले भेद नसतात, कारण ते भगवतांचे एकनिष्ठ भक्त असतात.  

विवेचनही दोन्ही एकमेकांस साधारण पुरक आहेत म्हणून त्यांचे विवेचन एकत्र करीत आहे.  

भक्ति करणे म्हणजे भगवंतावर अकारण प्रेम करणे हे आपण पाहिले आहे. दैनंदिन व्यवहार करताना मनुष्याला कधी जाणता तर कधी अजाणता मनुष्याला विविध प्रकारचे भेद पाळावे लागतात, अन्यथा त्याला व्यवहार करता येत नाही. उदा. वाहन कोणतेही असले तरी त्या वाहनाला ठेवण्यासाठी वाहनतळच उचित ठरते. वाहन महागडे आहे म्हणून कोणी त्याला झोपण्याच्या खोलीत नेऊन ठेवत नाही, अर्थात ते उचितही नसते.

संत अर्थात पूर्णत्व पावलेला भक्त हा स्वतः देव झालेला असतो. संत कधीही कोणामध्ये भेद पाळत नाहीत, भेद मानीत नाहीत.  

आपल्याला सर्वांना ज्ञात असलेले एक गीत आहे. — – 

*”टाळ बोले चिपळीला नाच माझ्या संगं*

*देवाजीच्या दारी आज रंगला अभंग ॥धृ॥*

*दरबारी आले रंक आणि राव*

*सारे एकरूप नाही भेदभाव*

*गाऊ नाचू सारे होऊनी नि:संग||||”*

 या स्थितीला संत पोहचलेले असतात. कोणत्याही संताच्या स्थानी जावं, तिथे आपल्याला मुक्त प्रवेश मिळेल.

संतत्व प्राप्त केलेला मनुष्य व्यवहारातील भेद लक्षात घेऊन त्या त्या माणसांशी, त्या त्या प्राण्यांशी त्या त्या परीने वर्तन करतात.

श्रीगोंदवलेकर महाराजांच्या चरित्रात अशी अनेक उदा. आहेत. त्यातील एक दोन मी इथे सांगतो. एकदा चोरी करायला आलेल्या चोरांना श्रीमहाराजांनी पकडले. त्यांना पोलिसात न देता, पुन्हा चोरी करणार नाही या अटीवर त्यांना अनुग्रह देऊन कृपांकित केले. एका मनुष्य त्यांच्यावर विष प्रयोग करण्यासाठी आला होता. आपल्याला मारायला आलेल्या मनुष्याला सुद्धा श्रीमहाराजांनी अनुग्रह देण्याची तयारी केली होती. पण तो मनुष्य घाबरून पळून गेला. तेव्हा श्रीमहाराज म्हणून गेले, की त्याने चांगली संधी सोडली आणि स्वतःचे नुकसान करून घेतले. इतके दयासिंधुत्व संतच दाखवू शकतात. कारण स्वतः परमात्मा त्यांच्या अंतर्यामी कायम स्थित असतो.

प्रकृतीचे स्वतःचे असे विधिविधान आहे. त्यानुसार घटना घडत असतात. अमुक वेळेस पाऊस पडणार किंवा ऊन पडणार हे प्रकृतीच्या अधीन आहे. अनेक सामान्य माणसांना प्रश्न पडतो की संत अवतार घेतात, तर लोकांचे दुःख, दैन्य दूर का करीत नाहीत? या प्रश्नांची अनेक उत्तरे आजपर्यंत आपण पाहिली असतील, पण पुढील उत्तर मला अधिक उचित वाटते.

एकदा श्री रमण महर्षी यांना एकाने प्रश्न विचारला की तुम्ही आपल्या शक्तीचा इतरांच्यापी कल्याणासाठी उपयोग का करीत नाही? तर त्यावेळी रमण म्हणाले की आम्ही दोन कुठे आहोत, आम्ही एकच आहोत. अर्थात मीच परमात्मा आहे आणि मीच सर्व काही करीत आहे. त्यामुळे अनेक वेळा अनेक लोकांचा गोंधळ होऊ शकतो.

साधक जेव्हा सिद्ध होतो, तो गुरू स्वरूप होऊन जातो. तो जगदाकार होऊन जातो. एकदा श्रीमहाराजांना एका भक्ताने विचारले की आमच्या अनेक प्रश्नांचे तुम्ही इतक्या त्वरेने कसे उत्तर देऊ शकता? त्यावर श्रीमहाराज म्हणाले की मला तुमचा प्रश्न आधीच कळलेला असतो. जेव्हा तुमच्या मनात प्रश्न निर्माण होतो

तेव्हाच तो मला कळतो आणि जेव्हा तुम्ही येऊन मला प्रश्न विचारता, तोपर्यंत उत्तर शोधायला मला अवधी मिळतो. मग मी त्याचे उत्तर देऊ शकतो. अर्थात श्रीमहाराज आपल्या मनात उपस्थित असतात, नव्हे ते कायम आपल्या मनात असतात, असे म्हणता येईल. भगवंताची एक उपाधी मन अशीच आहे, नाही का?

*”जेथे नाम, तेथे माझा प्राण | ही सांभाळावी खुण ||”*

– – श्री गोंदवलेकर महाराज

भक्तीच्या पहिल्या पायरीवर भक्त देवाला म्हणत असतो की *तस्य एव अहम्*.

अर्थात त्याचे रूप, गुणवर्णन ऐकले आहे, पण प्रत्यक्षात तो कसा आहे हे माहित नाही. पण तो मला आवडतो.

भक्तीच्या दुसऱ्या पायरीवर भक्त देवाला म्हणतो की *तव एव अहम्*.

अर्थात भक्त भगवंताच्या सान्निध्यात असतो. भगवंत भक्ताच्या सोबतीला असतो. *”जेथे जातो तेथे तू माझा सांगाती”* अशी भक्ताची खात्री असते.

भक्तीच्या तिसऱ्या पायरीवर भक्त आणि देव एकच होत असतात. *”मी तू पणाची झाली बोळवण, एका जनार्दनी श्रीदत्त ध्यानची* अशी स्थिती असते. देव आणि भक्त एकमेकाला म्हणतात, *त्वम् एव अहम्*. ही तदियतेची स्थिती म्हणता येईल.

यापुढील स्थितीमध्ये भक्त देवाला म्हणतो भक्तीचे सुख भोगण्यासाठी मला भक्तच राहू दे नि तू भगवंत रहा.  

संत तुकाराम महाराज या स्थितीचे वर्णन पुढील प्रमाणे करतात.

*”नको ब्रह्मज्ञान आत्मस्थिती भाव | मी भक्त तू देव ऐसे करी ॥१॥ दावी रूप मज गोपिका-रमणा | ठेवीन चरणावरी माथा ॥२॥ पाहोनि श्रीमुख देईन आळिंगन | जिवे लिंबलोण उतरीन ॥३॥ पुसता सांगेन हितगुज मात | बैसोनि एकांत सुख गोष्टी || || तुका म्हणे यासी न लावी उशीर | माझे अभ्यंकर जाणोनीया ॥५॥”*

संदर्भ : अभंग क्रमांक २२७८, सार्थ तुकाराम गाथा धार्मिक प्रकाशन संस्था

 जय जय रघुवीर समर्थ

नारद महाराज की जय!!!

– क्रमशः भक्तीसूत्रे – ७०, ७१, ७२, ७३.

© श्री संदीप रामचंद्र सुंकले (दास चैतन्य)थळ, अलिबाग. 

८३८००१९६७६

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ “तू तिमिरातून तेजाकडे नेणारी!” ☆ श्री संभाजी बबन गायके ☆

श्री संभाजी बबन गायके

? इंद्रधनुष्य ?

☆ “तू तिमिरातून तेजाकडे नेणारी!” ☆ श्री संभाजी बबन गायके

“आता एक खोटं लपवण्यासाठी आणखी एक खोटं बोलणार आहेस का? ” आईच्या या निर्वाणीच्या वाक्यावर साहेब नि:शब्द झाले!

त्यांनी सैन्य प्रशिक्षण महाविद्यालयात पोहोचल्या पोहोचल्या तेथील अधिका-यांना अगदी खरं खरं सांगण्याचा निश्चय केला. आणि आईचा आशीर्वाद घेऊन ते रवाना झाले!

सैन्य प्रशिक्षण आणि त्यातून अधिका-यांचं विशेष प्रशिक्षण हे शारीरिक, मानसिक आणि भावनिक क्षमतांचा कस पाहणारे असते. मिळू शकणा-या मोजक्या सुट्यांच्या दिवसांची हे धडधाकट, राकट लोक लहान मुलांसारखी वाट पहात असतात. आणि घरी आल्यावर अक्षरश: आपल्या आईच्या पदराखाली झोपतात… कारण हीच अशी एक जागा आहे जिथं सारं काही माफ असतं!

“मातोश्री अत्यवस्थ… त्वरीत या! ” अशी तार प्रशिक्षण महाविद्यालयात पोहोचली आणि अभ्यासात गुंतलेल्या जंटलमन कडेटला त्वरीत कळवण्यात आले… जाण्या-येण्याचे दिवस गृहीत धरून तातडीची सुट्टी मंजूर करण्यात आली. कडेटची प्रवासाची व्यवस्था झाली!

अत्यंत काळजीच्या मन:स्थितीत साहेब गावात पोहोचले तर सनईचे सूर कानी पडले… साहेबांच्या जिवलग मित्राचं लग्न होतं. या फौजी साहेबाने लग्नात आवर्जून उपस्थित राहावं, असं त्या मित्राला वाटणं स्वाभाविकच होतं! पण या कारणांसाठी प्रशिक्षणातून सुट्टी मिळणं अशक्य होतं. त्या मित्रांनी मग एक वेगळी युक्ती केली. त्यांनी साहेबांना तार धाडली… ”मातोश्री अत्यवस्थ… त्वरीत या! ” 

त्यावेळी मोबाईल, टेलिफोन इत्यादी संपर्क साधने फारशी सहज उपलब्ध नसल्याने काही चौकशी करणे अशक्य होते. साहेबांनी घाई-घाईत घर गाठले होते. मित्रांचा उद्देश ठीक होता… पण त्यांनी योजलेला उपाय कोणत्याही शिस्तीत अजिबात बसणारा नव्हता! साहेबांच्या मातोश्रींना मात्र हा प्रकार अजिबात रुचला नव्हता.

तरुण वय. साहेबांनी मित्राच्या लग्नाचा स्वागत समारंभ अगदी समरसून अनुभवला. गेल्या कित्येक वर्षांत न भेटलेले यार-दोस्त… दिवस कसे निघून गेले लक्षात नाही आलं. प्रशिक्षण महाविद्यालयात पोहोचण्यास एक पूर्ण दिवस उशीर होणार होता!

अतिशय कष्टात दिवस काढलेल्या त्या माऊलीच्या जीवनाचा पाया होता… सत्य… खरं… जे आहे ते! साहेब लहान असताना आई त्यांना म्हणायची… ”पुढे चांगले दिवस पहायचे असतील आयुष्यात, तर आता कठीण परिश्रमांन पर्याय नाही! अन्यथा तुझी जी क्षमता आहे, त्या क्षमतेला तू केवळ आळसामुळे न्याय दिला नाहीस… असं होईल!” 

कोणत्याही ग्रंथातील लांबलचक उपदेशांपेक्षा आईच्या हृदयातून आलेले हे शब्द या मुलाच्या काळजात घर करून बसले… आणि मग त्याने मागे वळून पाहिले नाही. शालेय जीवनापासून ते पदवीपर्यंत, आय. एम. ए. ची प्रवेश परीक्षा आणि एस. एस. बी. ची मुलाखत… हे सर्व टप्पे केवळ मेहनतीच्या जोरावर यशस्वीरीत्या पार पडले!

प्रशिक्षण महाविद्यालयात पोहोचताच लष्करी शिस्तीनुसार चौकशी झाली… पण साहेबांनी परिणामांची चिंता न करता चूक कबूल केली.. आणि जी शिक्षा दिली गेली ती निमूटपणे भोगली! ज्या प्लाटून कमांडर साहेबांपुढे या साहेबांनी आपला थेट कबुलीजबाब दिला होता, त्या कमांडर साहेबांनी पुढील कारकीर्दीत या साहेबांना त्यांच्याच लष्करी युनिटमध्ये नेमणूक दिली… त्यांना असा प्रामाणिक सैन्याधिकारी त्यांच्या हाताखाली हवा होताच!

मध्ये पस्तीस वर्षे उलटून गेली. हा प्रशिक्षणार्थी अधिकारी पुढे आपल्या सचोटी, मेहनत आणि शौर्य या गुणांच्या जोरावर भारतीय सैन्यात उत्तमोत्तम पदांवर काम करीत गेला. सैनिकी कर्तव्याच्या दृष्टीने अत्यंत आव्हानात्मक असलेल्या जम्मू-काश्मीरमध्ये तब्बल पाच वेळा त्यांची नेमणूक झाली. या पाचही वेळा त्यांनी आपला नेतृत्वगुणांचा ठसा उमटवला. स्पष्ट, थेट आणि खरे बोलणे हा स्वभाव झाल्याने कारकीर्द अत्यंत यशस्वी म्हणावी अशी झाली. सेना मेडल, विशिष्ट सेवा मेडल अशा पदाकाम्नी सन्मान झाला. आणि आता उद्या सेवेतील अखेरचा दिवस येऊन ठेपला अशी परिस्थिती निर्माण झाली.

अंबाला येथील लष्करी केंदावर मेजर जनरल रंजन महाजन, सेना मेडल, विशिष्ट सेवा मेडल यांना निरोप देण्याची तयारी सुरु होती. साहेबांनी चालकाला त्यांचे वाहन काढायला सांगितले आणि ते थेट दिल्लीच्या दिशेने निघाले. सुमारे तीन-साडेतीन तासांच्या प्रवासात त्यांना आईने आजवर दिलेल्या संस्कारांचे स्मरण होत होते. देशाप्रती निष्ठा, दयाभाव, संवेदनशीलता, संकटसमयी धीरोदात्त राहण्याचे सामर्थ्य आणि आत्मविश्वास! हे गुण मुलांमध्ये जन्मत:च नसतात… ते पेरावे लागतात… त्याला खतपाणी घालावे लागते… स्वत: तसं वागून दाखवावं लागतं… तेंव्हा तिन्ही लोकी झेंडा फडकवणारी मुलं तयार होतात. जिच्या हाती पाळण्याची दोरी… ती जगाचा असा उद्धार करू शकते. भारतीय सैन्यातील अशा अनेक मातांनी हे सिद्ध करून दाखवलं आहे!

साहेब पूर्ण लष्करी गणवेशात होते. घराचा दरवाजा कुणीतरी उघडला… आईसाहेबांना दाराशी कोण आलं आहे ते समजलं नाही! साहेबांनी खास रुबाबदार पद्धतीने पावलं टाकली… आणि आईसाहेबांना कडक मानवंदना दिली! मातोश्रींनी सुद्धा थरथरत्या हातांनी मोठा साहेब झालेल्या लेकाला सल्यूट केला… आणि पुढच्या क्षणी त्याला मिठी मारली… त्याच्या गालाचे हळूवार चुंबन घेतले. यावेळी दोघा मायलेकांचे चेहरे हे जगातल्या सर्वाधिक आनंदी माणसांचे चेहरे होते!

माणूस आईसाठी सदैव लहानच असतो. आई नावाची शिदोरी सरतही नाही आणि उरतही नाही.

गेल्या वर्षी ८ फेब्रुवारी, २०२६ रोजी महाजन साहेबांचे मातृछत्र हरपले! माझ्या आयुष्याला खरा अर्थ माझ्या आईमुळे प्राप्त झाला, असे महाजन साहेब मोठ्या अभिमानाने सांगतात 

(मेजर जनरल रंजन महाजन (सेवानिवृत्त) यांनी जम्मू-काश्मीर मध्ये दीर्घकाळ सेवा बजावली. त्यांच्या तेथील अनुभवावर आधारीत Kashmir in the life of fire… हे पुस्तक नुकतेच प्रसिद्ध झाले आहे. या पुस्तकाचे मराठी, हिंदी भाषांतर व्हायला पाहिजे. माझाही प्रयत्न राहील. २०२३ मध्ये सेवानिवृत्त होण्याच्या एक दिवस आधी घरी जाऊन आपल्या आईला मानवंदना देतानाचा महाजन साहेबांचा विडीओ लाखो लोकांनी पाहिला! आपल्यापैकी काही वाचकांनी हा विडीओ कदाचित पाहिला नसेल म्हणून हा लेख. दिवंगत मातोश्री यांचे नाव खूप शोधले पण कुठे उल्लेख दिसला नाही. असो… आईचे नाव… आईच! ) 

जय हिंद!

© श्री संभाजी बबन गायके.

न-हे, पुणे,  मो 9881298260

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचतांना वेचलेले ☆ पोच पावती… – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती सौ. शुभदा भास्कर कुलकर्णी (विभावरी) ☆

सौ. शुभदा भास्कर कुलकर्णी (विभावरी)

📖 वाचताना वेचलेले 📖

☆ पोच पावती… – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती सौ. शुभदा भास्कर कुलकर्णी (विभावरी)

मागे एकदा पोस्टात गेलो असताना एक आजोबा स्टाफला विचारत होते “ह्याची पोचपावती मिळेल ना?

बरेचदा मीही हिला सांगतो, acknowledgment म्हणून जपून ठेव ग!

नेहमीप्रमाणेच तो शब्द माझ्या मनात फिरू लागला आणि बोटं लिहू लागली…

“पोचपावती” ही आपल्या व्यवहारात जितकी महत्वाची, तितकीच आयुष्यातही का असू नये?

ही पोचपावती म्हणजे प्रत्येक वेळी कौतुक असाच अर्थ नसावा.

कधीतरी एखाद्या गोष्टीची घेतलेली दखल किंवा म्हणतात ना appreciation असू शकतं.

ह्या पोचपावतीचे माझ्या आयुष्यातील उत्तम उदाहरण म्हणजे आमचे आई- अप्पा.

घरात कोणताही एकत्र कार्यक्रम होवो किंवा एखादा नवीन पदार्थ केला, कोणतीही चांगली कृती केली की सुनांना ते तसं आवर्जून सांगतात, “छान झाला बरं का आजचा कार्यक्रम! ” आणि मग त्यांच्या ह्या शब्दांनी कार्यक्रमामुळे झालेली दमणूक एकदम निघून जाते आणि पुन्हा पुढचा कार्यक्रम करायला अजून उत्साह येतो!

पोचपावती तुमच्या आयुष्यात मोठी जादूची कांडी फिरवते.

एखाद्याला त्याच्या छोट्या छोट्या गोष्टींचं appreciation देऊन बघा. अगदी मनापासून त्याच्या चेहऱ्यावर कसं हसू फुलतं!

आमची घरकामवालीला गजरे, फुलं घालून यायची फार आवड! कधी त्या मोठा गजरा घालून आल्या कामाला की हिच्या तोंडून उस्फूर्तपणे येतं, “प्रमिला काय मस्त दिसतेस! चल. एक फोटो काढते तुझा! ” ह्यानेसुद्धा त्या खूप खूश होतात.

लहानांपासून मोठ्यांपर्यन्त आणि अगदी लहान गोष्टींपासून मोठ्या गोष्टींसाठीही पोचपावती खूप मोठा परिणाम करून जाते आणि छान आठवण मनात ठेवून जाते.

एखादं मोठं प्रोजेक्ट complete केल्यावर बॉसने त्याची घेतलेली दखल असो, की वर्गात “छान निबंध लिहिलास हो! ” असं म्हणून बाईंची मिळालेली शाबासकी असो, हिने खपून केलेल्या पदार्थाची घरातल्यांनी केलेली स्तुती असो की, कधीतरी नवीन साडी नेसल्यावर हिला न बोलता दिलेली दाद असो.

ह्या पोचपावतीसाठी माणूस फक्त जवळचाच हवा असं नाही. कधीतरी आपल्याच दुकानदारालाही म्हणावं, “काका, तांदूळ चांगले होते हं तुमच्याकडून घेतलेले. “

सामान्य माणसांपासून अगदी कलाकारांपर्यन्त ह्या पोचपावतीची गरज असतेच. ही दखल घायला आणि द्यायलाही वयाचं बंधन नसावं कधीच…

काही काही नाती ही पोचपावती पलीकडची असतात, पण तरीही अधूनमधून ह्याचा शिडकावा नात्यात नक्की आनंद देऊन जातो..!

बरेचदा सततच घेतली जाणारी दखल काही खरी वाटत नाही… तसं करूही नये. कारण पोचपावती जितकी उस्फूर्त, तितकीच जास्त खरी!

पोच पावती फक्त शब्दांतूनच नाही, तर डोळ्यांतून… कधी कृतीतून, स्पर्शातूनही व्यक्त व्हावी. जसं जसं ज्याच्याशी नातं तशी तशी ती पोचवावी…

कधी योग्य आदर ठेवून, कधी गळामिठी मारून, अगदी कधी “च्यामारी! भारीच काम केलंस तू भावड्या! ” अशी वेगळ्या भाषेतूनही यावी.

माणूस जितका दिलखुलास तितकीच ही दाद उस्फूर्त! … महत्त्वाचं म्हणजे ती स्वीकारणाराही तितकाच ह्या मुलांच्या भाषेत cool dude हवा.

ह्या पोचपावतीने काम करायला दुप्पट ऊर्जा मिळते, उत्साह मिळतो, नातं घट्ट व्हायला एक छोटासा धागा मिळतो…

आणि तसं म्हणाल तर ह्यासाठी काही लागत नाही. फक्त मोकळं आणि स्वच्छ मन…!

तर मग होऊन जाऊ द्यात एखादी झकास, दिलखुलास दाद!

लेखक : अज्ञात

संकलन व प्रस्तुती : शुभदा भा. कुलकर्णी 

कोथरूड-पुणे

मो.९५९५५५७९०८

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ तो आणि मी…! – भाग १०१ ☆ श्री अरविंद लिमये ☆

श्री अरविंद लिमये

? विविधा ?

☆ तो आणि मी…! – भाग १०१ ☆ श्री अरविंद लिमये ☆

(पूर्वसूत्र- डॉ. परांजपे हे आमचे फॅमिली डॉक्टर. त्यांच्याशी ताईच्या प्रॉब्लेमबद्दल मोकळेपणाने बोलून मनावरचं ओझं हलकं करावसं वाटलं. त्यांना फोन करून मी त्यांच्या भेटीची लगेचची वेळ ठरवली, तेव्हा मनातला अंधार दूर करणारा त्यांच्या रूपातला एक आशेचा किरण तोवर अंधारात चाचपडणाऱ्या मला पुढं पाऊल टाकण्याची प्रेरणा देत होता! )

“तुम्ही त्यांचे रिपोर्टस् मला दाखवण्याची व्यवस्था करू शकाल कां? त्यांनाही इथे घेऊन येऊ शकलात तर बोटाची जखमही मला तपासता येईल. ” डॉक्टर म्हणाले. ते रास्तही होतंच. पण हे सगळं जमवता येईल कां हा मात्र प्रश्न होता. याला कारणही तसंच होतं.

तो शनिवार होता. तसंही मी आज ताईला भेटायला कोल्हापूरला जाणार होतोच. त्यामुळे सगळ्या रिपोर्टसच्या झेराॅक्स काॅपीज् आणणं कठीण नव्हतं. पण ताईला कसं आणायचं? मुळात तिकडे आॅपरेशनची तारीख ठरवण्यापूर्वी दुसऱ्या एका आॅर्थोपेडीकचे सेकंड ओपिनियन घेतलेले होते. मग पुन्हा मुद्दाम सांगलीला तिला आणून दुसऱ्या एका डॉक्टरांचं मत विचारण्याची आवश्यकता नाही असं ताईच्या घरच्यांना वाटलं तर? आज मी दुपारनंतर तिथं जाऊन, सर्वांशी चर्चा करून निर्णय घ्यायचा म्हंटलं तरी लगोलग आजच ताईला आणणं शक्य कसं होणार? उद्या रविवार म्हणजे परांजपे डॉक्टरांचं क्लिनिकला उद्या सुट्टी आणि सोमवारी ऑपरेशनची तारीख आहे. मग करायचं काय?

यातून काही मार्ग निघेल याची शक्यता मला दुरास्पतच वाटत होती. मी डॉक्टरना ही अडचण सांगितली तेव्हा क्षणाचाही विचार न करता ते म्हणाले,

” ठीक आहे. त्या उद्या दुपारी ३ ते ४ च्या दरम्यान येऊ शकल्या तर त्यांना आमच्या घरी घेऊन या हवंतर. कांहीच प्राॅब्लेम नाही. “

मला गहन वाटणारा प्रश्न असा चुटकीसरशी सुटणं हा शुभशकूनच होता माझ्यासाठी! आणि आश्चर्य म्हणजे एखादं किचकट, अवघड वाटणारं गणित चुटकीसरशी सुटावं तशी पुढची सगळी सूत्रंही आपोआप हवी तशी विनाविलंब हलू लागली..!!

त्यादिवशी मी ठरल्याप्रमाणे ताईकडे गेलो. आम्ही ट्रीपला गेलेलो आहोत हेच गृहीत धरलेल्या सर्वांना माझं असं अचानक तिथं जाणं आश्चर्य वाटावं असंच होतं.

” तू? तुम्ही ट्रीपला गेला होतात ना? मग असं मधेच? ” ताईनं विचारलं.

ट्रीप अर्धवट कां सोडावी लागली ते मी थोडक्यात सांगितलं आणि मुख्य विषयालाच हात घातला.

“पण आलो ते बरंच झालं. कारण काल रात्री घरी आल्यावर सलिलकडून सोमवारी तुझं ऑपरेशन ठरल्याचं समजलं आणि.. “

“हो रे. बघ ना काय होऊन बसलंय.. ” ताई म्हणाली. मग पुढे त्याचीच चर्चा. उदय-योगिता म्हणजे ताईचा मुलगा न् सून.. , माझे मेहुणे यांच्याकडून हे सगळं कां, कसं झालं ते सविस्तर समजलं.

” भोग म्हणायचे आपले. दुसरं काय? तरी योग्य निदान लवकर झालं म्हणून बोटावरच निभावलंय. नाहीतर कांही खरं नव्हतं. ” ताई म्हणाली.

त्या सर्वांनी मनाविरूध्द का होईना पण सगळं स्वीकारलं होतं!

“मलाही ऐकलं तेव्हा धक्काच बसला होता. यातून कांहीतरी मार्ग निघेल या आशेने आज सकाळीच सांगलीतल्या डाॅ. परांजपेंची भेट घेऊन मी त्यांना हा प्राॅब्लेम सांगितलाय. ” असं म्हणून मी डाॅक्टर काय म्हणाले ते सविस्तर सगळं सांगून टाकलं.

“तुम्ही दुसऱ्या ऑर्थोपेडिकना रिपोर्टस् दाखवून आधीच त्यांचं सेकंड ओपिनियन घेतलंय ते गरजेचंच होतं. पण तरीही सोमवारी ऑपरेशन होण्यापूर्वी उद्याच ताईला घेऊन तुम्ही कुणीतरी सांगलीला माझ्याकडे येऊ शकलात तर आपण डॉक्टरांची त्यांच्या घरीच जाऊन भेट घ्यायचीय असं ठरलंय. त्यांचं घर आमच्या घरापासून जवळच आहे. मुख्य म्हणजे ते माझ्या माहितीतले एकमेव असे डॉक्टर आहेत ज्यांनी एम. डी. आयुर्वेद आणि एम. बी. बी. एस् अशा दोन्ही डिग्रीज् प्राप्त केलेल्या आहेत. त्यांच्या घरी आजोबांपासून आयुर्वेदाचं ज्ञान आणि वैद्यकी दोन्ही परंपरेने चालत आलेलं आहे. शिवाय यांची ऍलोपथीची डिग्रीही योग्य ट्रीटमेंट देण्यासाठी त्यांना उपयोगी पडतेय. ऑपरेशन शिवाय दुसरा कांहीच उपाय नाहीय असंही रिपोर्ट्स पाहून आणि जखम तपासून ते म्हणतील कदाचित, तरीही शेवटपर्यंत आपण प्रयत्न केला नाही असं नको ना व्हायला? काय करूया? ” मी विचारलं.

” कांहीच हरकत नाही. आम्ही आईला घेऊन उद्या येतो. ” उदयची ही लगेचची सकारात्मक प्रतिक्रिया माझ्यासाठी उत्साहवर्धक होती. मी सांगलीला परतलो.

दुसऱ्या दिवशी उदय आणि योगिता कारमधून ताईला घेऊन आले. डाॅ. परांजपेनी बोटाची जखम तपासली. सगळे रिपोर्टस् नजरेखालून घातले. आणि म्हणाले,

“मी ८०% खात्री देतो. बोट वाचेल. “

ऐकून माझ्या अंगावर शहाराच आला. हे सत्य कीं स्वप्न समजेचना. ताई, उदय, योगिता यांच्या मनातली भावनाही यापेक्षा वेगळी नव्हती.

आमच्या मनातली उरलेल्या २० टक्क्यांची अनिश्चितता कां? ही शंका आम्ही न सांगताच समजल्यासारखं डॉक्टर म्हणाले,

“८०% खात्री मी देतोय ती मी तुम्हाला सांगणार असलेल्या उपायांबद्दलची. बाकी २०% तुम्ही ते सर्व उपाय किती चिकाटीने आणि नियमित करु शकाल याच्यावर अवलंबून असेल. ” ते म्हणाले. हे कसं तेही त्यांनी आम्हाला सविस्तर समजावून सांगितलं.

‘ते सांगतील त्या पध्दतीने मसाज आणि बॅंडेज अनेक दिवस चिकाटीने करावं लागेल. त्यात घरच्या इतरांचीही मनापासूनची मदतही अत्यावश्यक आहे. शिवाय पेशंटचंही न कंटाळता सातत्यपूर्ण सहकार्य हवं. फरक अगदी हळूहळूच जाणवेल पण अखेर गुण येईल हे नक्की. ‘ हा त्यांच्या सविस्तर सांगण्याचा मतितार्थ होता!

” डाॅक्टर, बोटाला मसाज आणि बॅंडेज कसं, कधी आणि दिवसातून किती वेळा करायचं ते सांगा. मी ते कितीही दिवस करावं लागलं तरी नियमित करीन. आईही ते सगळं शांतपणे करुन घेणाऱ्या आहेत. आम्ही मॅनेज करू. ” योगिता मनापासून म्हणाली. ताईचं बोट वाचायची शक्यता आहे हेच ताईच्या घरच्या सगळ्यांसाठीच असं खूप महत्त्वाचं होतं!

“उद्याचं ऑपरेशन करायचं नाहीये हे त्या डॉक्टरना लगेच सांगायला हवं. ” उदय म्हणाला.

” हो ते सांगाच. प्रयत्नाचा एक भाग म्हणून आयुर्वेदीक ट्रीटमेंट घेणार आहोत हेही सांगून टाका. त्यात लपवण्यासारखं कांहीच नाहीय. शिवाय ऑपरेशन करायचं नाहीये असं नका म्हणू. ते थोडे दिवस पुढे ढकलूया असं सांगा. ” परांजपे डाॅक्टर म्हणाले.

कोल्हापूरच्या डॉक्टरनी ‘सध्या घेत असलेल्या मी दिलेल्या गोळ्या बंद करणं धोक्याचं ठरेल’ याची कल्पना देऊन आॅपरेशन पुढं ढकलणं मान्य केलं. पण सध्या सुरू असलेली पहिली औषधं बंद करणं धोक्याचं ठरू शकेल असं निक्षून सांगितलं. अर्थात डाॅ. परांजपेनीही त्याला विरोध दर्शवला नाही हे महत्त्वाचं!

या आधी मी ‘ एखादं अतिशय अवघड आणि किचकट गणित चुटकीसरशी

सुटलं जावं तशी पुढची सगळीच सूत्रं वेगानं हलू लागली’ असं म्हटलं होतं त्याची ही सुरुवात होती!

डॉ. परांजपे यांच्या ट्रीटमेंटच्या, त्यांनी लिहून दिलेल्या गोळ्या, रोज सकाळ संध्याकाळ असं दोन वेळा बोटाला करायचा मसाज आणि जखमेला करायचं ड्रेसिंग या तीन महत्त्वाच्या गोष्टी होत्या. मसाज साठी आवश्यक ते तेल डॉक्टर स्वतः तयार करून देणार होते. ते तेल बोटाला हलक्या हाताने मसाज करून पूर्ण मुरवायचे होते. ड्रेसिंग करण्यापूर्वी जास्त प्रमाणात पिकून लिबलिबीत झालेल्या देशी केळ्याचा गर कुस्करून त्याचा लेप जखमेवर व्यवस्थित लावून त्यावर मेडिकेटेड कापसाची घडी ठेवून मग बँडेज करायचे होते.

ट्रीटमेंट नियमित सुरू झाली. योगिताने स्वीकारलेली जबाबदारी अतिशय निगुतीने अगदी मनापासून पार पाडली. पहिले दिड-दोन महिने कांहीही फरक जाणवला नाही तरी तिने धीर सोडला नाही. नंतर मात्र अगदी कणाकणानंच पण बोटावरची सूज कमी होतेय असं मसाज करताना तिला जाणवू लागलं. आणि पुढेही खूप दिवस चिकाटीने हा नित्यक्रम असाच सुरू ठेवल्यानंतर अखेर बोटावरची सूज हळूहळू करत एक दिवस पूर्णतः उतरली. त्याचवेळी हाडांचा भुगा होऊन अतिशय पोकळ झालेलं त्या बोटाचं हाडही भरून येऊ लागलं आणि अखेर ताईचं बोट वाचलं!!

या घटनेला आज दहाबारा वर्षं उलटून गेलीयत. पण ती आठवण मात्र मी कधीच विसरू शकणार नाही. या दरम्यानच्या प्रत्येक राखीपौर्णिमेला आणि भाऊबीजेला जेव्हा ताई मला ओवाळते तेव्हा त्या निरांजनाच्या प्रकाशात माझ्याही नकळत माझी नजर तिच्या हातातल्या ताम्हणाखाली लपलेल्या तिच्या ‘त्या’ बोटाचा वेध घेत असते!!

इथं आयुर्वेदिक ट्रीटमेंटला गुण येणं हा चमत्कार नव्हताच. चमत्कार लपलेला होता तो त्या त्या वेळी घडत गेलेल्या सगळ्या घटनाक्रमांत! त्यातील प्रत्येक वळणावर ‘तो’ होताच. त्या त्या प्रसंगात ‘तो’ स्वतःच घालत असलेली असंख्य धाग्यादोऱ्यांची घट्ट वीण मला इतक्या प्रदीर्घ काळानंतर आजही स्वच्छ जाणवते आणि मी ‘त्या’च्यापुढे मनोमन नतमस्तक होतो!!

क्रमश:…  (प्रत्येक गुरूवारी)

©️ अरविंद लिमये

सांगली (९८२३७३८२८८)

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ “पहाटेचे स्वप्न…” भाग – २ ☆ श्री सुधीर करंदीकर ☆

श्री सुधीर करंदीकर

? मनमंजुषेतून ?

☆ “पहाटेचे स्वप्न…” भाग – २ ☆ श्री सुधीर करंदीकर

(काही लोकांना होर्डिंग मधला हा बदल लक्षात आलेला दिसत नव्हता. पण काही ठिकाणी घोळके जमायला लागले होते. थोडं पुढे गेल्यावर एलबीएस रोड लागला. ठिकठिकाणी स्पीड लिमिट ३० किमी असे बोर्ड दिसत होते.) 

इथून पुढे – – –  

एका मोठया होर्डिंगवर काल बऱ्याच स्थानिक नेत्यांचे फोटो होते, आज त्याची बॅक ग्राउंड फिकट पिवळी झाली होती व त्यावर असा मजकूर होता —

रस्त्यावर सगळ्यांचे स्वागत. नियम पाळा आणि सुरक्षित घरी पोहोचा / ऑफिसला पोहोचा / कामाच्या ठिकाणी पोहोचा.

१) सिग्नल तोडला, तर सर्व अंगाला खाज सुटू शकते आणि गाडी चालवणे अशक्य होऊ शकते

२) वेग मर्यादा तोडली / वेडी वाकडी गाडी चालवली, तर डोळ्यासमोर अंधारी / चक्कर येऊ शकते. गाडी साईड ला उभी करा. १०-१५ मिनिटांनी अंधारी जाईल.

३) झेब्रा मार्किंग वर गाडी उभी केली, तर उलटी होऊ शकते आणि कपडे खराब होऊ शकतात

४) गाडी चालवतांना मोबाईल वर बोलला, तर एकसारख्या शिंका येऊ शकतात, किती वेळ, ते सांगता येत नाही

५) फुटपाथवर गाडी घातली, रस्त्यावर उलट्या दिशेनी गाडी घातली / नो एंट्री मध्ये गाडी घातली, तर गाडी बंद पडेल व १० मिनिटे तरी सुरु होणार नाही.

६) पादचारी मंडळींना पण काही बंधने पाळणे, आता बंधनकारक राहील. मनमानेल तसा वावर, आता रस्त्यांवर करता येणार नाही. सिग्नल बघून रस्ता ओलांडा / झेब्रा मार्किंग वरूनच रस्ता ओलांडा. जिथे फुटपाथ आहे, तिथे फुटपाथवरच चालायचे आहे.

असे न केल्यास पायात गोळे येऊ शकतात. किती वेळ पाय दुखेल हे सांगता येत नाही.

अशाच आशयाची होर्डिंग ठिकठिकाणी दिसत होती. सिग्नल नेहेमीप्रमाणे लाग – वीझ होत होते आणि वाहन चालक नेहेमीच्या मस्तीत गाड्या मारत होते. रस्ता क्रॉस करणारे मुठीत जीव घेऊन, इकडे – तिकडे जात येत होते. नेहेमीप्रमाणे सगळ्यांचीच रस्त्यावर मनमानी सुरु होती. चालणारी बरीच मंडळी नवीन होर्डिंग वाचण्यात मग्न होती, पण त्यांना काहीच उलगडा होत नव्हता, की, होर्डिंग कुणी बदलली आणि हा सगळा काय प्रकार आहे? बाजूच्या पानपट्टीजवळ उभे राहून लोक पेपर बघत होते. सगळ्याच पेपरमध्ये फ्रंट पेज वर होर्डिंग वरची माहिती छापून आली होती. पेपरमध्ये ही माहिती कोणी छापली, हे कोडे पेपरवाल्यांना पण पडले असणार! त्या दिवशी संध्याकाळी, मी मुद्दाम चौकात चक्कर मारली. सकाळ ची काही होर्डिंग काढून, पुन्हा तिथे नेहेमीची वाढदिवस / अभिनंदन अशी होर्डिंग आली होती. टीव्ही च्या बातम्यांमध्ये ह्या सगळ्या बातम्या येत होत्या, पण हे कसे घडले आणि या मागे कोण? हे सगळ्यांकरता कोडेच होते.

दुसऱ्या दिवशी आम्ही नेहेमीप्रमाणे सकाळी फिरायला बाहेर पडलो. करिष्मा वरून पुढे मेन रोड वर आलो. आणि चौकामध्ये डावीकडे फुटपाथवर उभे राहिलो. मी घड्याळात पाहीले. ८ ला १० मिनिटे कमी होती. मी मनामध्ये १० मिनिटांचा काउंट डाऊन सुरु केला. वाहतुकीची मनमानी नेहेमीप्रमाणे सुरु होती. आश्चर्य म्हणजे काल दुपारी बदललेली होर्डिंग पुन्हा वाहतुकीचे नियम दाखवत होती. सगळ्या पेपरच्या फ्रंट पेजवर कालच्याप्रमाणेच पुन्हा वाहतूकनियम आले होते.

घड्याळात ८ वाजले आणि सिग्नल तोडून जाणाऱ्या, तीन टू व्हीलर आणि एक कार थोड्या पुढे येऊन थांबल्या होत्या. चालवणारे खाली उतरून अंग खाजवत होते. अजून गर्दी तशी तुरळकच होती आणि हळू हळू वाढत होती. झेब्रा मार्किंग वर थांबलेल्या कार ड्रायव्हर ला उलटी झाली. काच खाली करेपर्यंत उलटी कपड्यांवर झाली असावी. नवरा बायको बसलेली स्कुटी झेब्रा मार्किंग वर थांबली आणि चालवणाऱ्या बायकोला उलटी झाली. नवरा खुश झाला आणि त्यानी बायकोचे अभिनंदन केले.

गाडीवर मोबाईलवर बोलणाऱ्यांना शिंका सुरु झाल्या. दोघींचे मोबाईल खाली पडले. रस्त्यावर थोडी गर्दी वाढली, म्हणून एकानी आपली बाईक आम्ही उभे होतो तिथे फुटपाथवर घातली. आणि लगेचच तो थांबला. तेवढ्यात बाजूचा पानपट्टीवाला त्याला म्हणाला, “दादा, फुटपाथवर बाईक चालवू नका, गाडी बंद पडेल ”. बाइकवाल्यानी त्याला मुर्खात काढले आणि बाईकला किक मारली. किक वर किक मारतोय, पानपट्टीवाल्यावर चिडून किका मारल्या, पण गाडी सुरु कुठे होतेय! आता तो घाबरला आणि मुकाट फुटपाथवरून खाली उतरला. मी त्यांना म्हटलं – दादा, १० मिनिटे शांत बसा, पाय दुखले असतील. १० मिनिटांनी गाडी सुरु होते असं पेपरला आलयं.

आम्ही गणपती मंदिराकडे चालायला लागलो. बरेच पायी चालणारे फुटपाथवर बसलेले दिसत होते. मी एका आजोबांना विचारलं – आजोबा बरे वाटत नाही का? ते म्हणाले पायात गोळे आले आहेत. होर्डिंग्ज वर लिहिल्याप्रमाणे, आता चालणाऱ्यांनी पण चालायचे नियम पाळायला पाहिजेत. स्पीडनी गाड्या मारणारे साईडला थांबले होते. सिग्नल तोडून सुटणारे, बाजूला थांबून, पाठ – हात – पाय खाजवत होते. शिंकांनी घामाघूम झालेल्या एक मॅडम कार च्या बाहेर उभ्या राहून रिलॅक्स होत होत्या. शिंका थांबल्यावर, कार मध्ये बसतांना, त्यांनी मोबाईल मागच्या सीट वर फेकला आणि कार सुरु करून पुढे गेल्या. रस्त्यावर दोन प्रकारचे लोक दिसत होते. “ ह्या, असे कुठे नियम असतात का? ” म्हणणारे आणि नंतर शिंका -उलटी यांना जवळ करणारे. आणि दुसरे म्हणजे, पुढच्याला ठेच, मागचा शहाणा, हे समजून शांत पणे नियम पाळणारे.

स्वीट मार्ट चौकातून आम्ही पुढे गेलो. पुढे डावीकडे एक मोठी सोसायटी आहे. तिथून बाहेर पडणारे सगळे रस्त्यावरून उलटे मागे चौकापर्यंत येतात. आणि मग वळून पुढे जातात. आम्ही तिथे पोहोचलो आणि आतून एक भली मोठी कार बाहेर आली आणि वळल्यावर लगीच थांबली. तिथला वॉचमन पेपर घेऊन आला आणि म्हणाला, ’साब, उलटे मत जावं, गाडी बंद पडेगी ’. आम्ही बाजूला उभे राहून बघत होतो. गाडी खरंच बंद पडली होती. गाडी मालकानी बराच वेळ चावी फिरवली, नंतर बॉनेट उघडले. मी त्यांना म्हटलं – काका, काहीही करू नका, १० मिनिटे थांबा, गाडी आपोआप सुरु होईल, तसं आजच्या पेपर मध्ये दिलेले आहे. १० मिनिटे त्यांच्याशी गप्पा झाल्या. गाडी सुरु झाली. आता हा उलटा शॉर्ट कट चालणार नाही, असे म्हणून, बाय करून, काका निघाले.

दिवसभर असेच सगळे सुरु असावे. टीव्ही वर बातम्यांमध्ये सगळ्या चॅनल वर आमचे शहर झळकत होते. तब्येत ठणठणीत असणारे पण अचानक चक्कर आलेले, शिंका वाले, अंगाला खाज सुटलेले, अंगावर उलटी झालेले, अचानक गाड्या बंद पडलेले, यांच्या मुलाखती, हेच चक्र सुरु होते.

** तिसरा दिवस : पेपरच्या बातम्या

शहरातला जीवघेणा ट्रॅफिक आता सुखकर झाला आहे. पादचारी खुशीत आहेत.

** चौथा दिवस

 कार्पोरेशन नि युद्ध पातळीवर रस्त्यांवरचे सर्व स्पीड ब्रेकर आणि रम्बलर काढले. खड्डे बुजवणे जोरात सुरु झाले. सर्व लोक खुश. या सगळ्यांमागे कोण? हा तपास जोरात सुरु, पण काहीही प्रगती नाही. राजकीय पुढाऱ्यांचे मार्मिक उत्तर – अरे भाई, सब लोग खुश है ना! हम यही चाहते है. आप लोग आम खाते रहो, आप को पेड से क्या मतलब है!

** पाचवा दिवस

गिनीज बुक मध्ये वर्ल्ड रेकॉर्ड ची दखल : “या शहरा मध्ये वाहतूक अपघात – शून्य”

हा अनुभव सांगण्याकरता मनवा आणि मेघना कधी भेटतात, याच्या ‘मी’ प्रतीक्षेत! भारद्वाज पक्षी आता गेटवर कधी बसतो आणि दिसतो, याच्या “मी” प्रतीक्षेत!! आणि, मी तयार केलेल्या यादीमधल्या, पुढच्या आयटम करता, देव कधी स्वप्नामध्ये येतात, याच्या “मी” प्रतीक्षेत!!!!

समाप्त –

© श्री सुधीर करंदीकर

मो. 9225631100 – ईमेल – srkarandikar@gmail. com

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares