मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ मनाचे श्लोक – एक सार्वकालिक ‘मनोपनिषद’… – श्लोक ३१ आणि ३२ ☆ श्री विश्वास देशपांडे ☆

श्री विश्वास देशपांडे

? इंद्रधनुष्य ?

☆ मनाचे श्लोक – एक सार्वकालिक ‘मनोपनिषद’… – श्लोक ३१ आणि ३२ ☆ श्री विश्वास देशपांडे ☆

श्लोक क्र. ३१ – – – 

महा संकटी सोडिले देव जेणे|

प्रतापे बळें आगळा सर्वगूणें|

जयाते स्मरे शैलजा शूलपाणी|

नुपेक्षी कदा राम दासाभिमानी|३१|

अर्थ : सर्व देवांवर जेव्हा अत्यंत कठीण संकट आले तेव्हा प्रभू रामचंद्राने त्यांना त्यातून सोडवले. असा तो श्रीराम पराक्रमाने, बळाने आणि सर्व गुणांनी संपन्न आहे. प्रत्यक्ष भगवान शंकर आणि पार्वती त्याचे स्मरण करतात. असा हा दासाभिमानी असलेला भगवंत आपल्या दासाची म्हणजेच भक्ताची कधीही उपेक्षा करीत नाही.

विवेचन मागील श्लोकात भगवंताचे सेवक असलेल्या व्यक्तीकडे वक्रदृष्टीने पाहण्याची कोणाची हिंमत नाही असे समर्थांनी सांगितले आहे. या श्लोकात तो भगवंत कसा श्रेष्ठ आहे ते सांगताना त्याच्या गुणांचे किंवा चरित्राचे गुणवर्णन समर्थ करतात.

रावण हा महापराक्रमी होता परंतु आपल्या सामर्थ्याचा त्याने दुरुपयोग केला आपल्या सामर्थ्याच्या बळावर त्याने देवांनाही बंदिवान केले. हे म्हणजे देवांवर आलेले मोठे संकट होते. श्रीरामांनी रावणाशी युद्ध करून सीतेची सुटका केली, अनितीने वागणाऱ्या रावणाचा वध केला आणि त्याच्या बंदीवासात असलेल्या देवांना मुक्त केले. असा हा राम महाप्रतापी आणि महाबलशाली आहे.

समर्थ रामाचे वर्णन करताना म्हणतात, ” आगळा सर्वगुणें… “म्हणजे भगवंत सर्व गुणसंपन्न तर आहेच परंतु अनेक परस्परविरोधी गुण त्याच्या व्यक्तिमत्वात एकवटले आहेत. तो जसा महापराक्रमी आणि शूरवीर आहे, त्याचवेळी तो भक्तवत्सल आहे. शबरीची उष्टी बोरे प्रेमाने खाणारा आहे, आपला भक्त असलेल्या पुंडलिकासाठी युगानुयुगे वीटेवर उभा राहणारा आहे, जनाबाईला दळण दळू लागणारा आहे, नाथांघरचे पाणी भरणारा आहे. अशी त्याची किती रूपे वर्णावी!

त्याचप्रमाणे देवांवर जेव्हा संकट आले त्या त्यावेळी विष्णूने अवतार धारण करून देवांचे रक्षण केले आहे. पुराणातून अशा प्रकारच्या कथा आपण नेहमीच वाचतो. जेव्हा जेव्हा देवांवर संकट येत असे तेव्हा तेव्हा सर्व देव इंद्राच्या नेतृत्वाखाली श्रीविष्णूकडे आश्रय मागण्यासाठी जात असत आणि मग तो वेगवेगळे अवतार धारण करून त्यांचे रक्षण करीत असे.

विष्णू हा जगाचा पालन कर्ता आहे. ब्रह्मदेव हा जन्म देणारा आहे आणि भगवान शिव संहार करणारा आहे. पालन करणारा हा नेहमी जन्म देणाऱ्या आणि संहार करणाऱ्या पेक्षाही श्रेष्ठ असतो. यशोदेने श्रीकृष्णाचे पालनपोषण केले, त्याच्यावर संस्कार केले म्हणून जन्म देणाऱ्या देवकीपेक्षा श्रीकृष्णाची माता म्हणून यशोदेला आधी मान मिळतो. मुलांना जन्म देणे सोपे असते परंतु पालक होणे मात्र कठीण! काही लोक मुलांना जन्म देऊन सोडून देतात परंतु जे लोक अशा अनाथ मुलांना आई-वडिलांची माया देतात, त्यांचे पालनपोषण करतात ते माता पिता श्रेष्ठ होत. कुंतीने कर्णाला जन्म देऊन सोडून दिले परंतु धृतराष्ट्राचा सारथी असलेल्या अधिरथ आणि त्याची पत्नी राधा यांनी कर्णाचा सांभाळ मोठ्या प्रेमाने केला. म्हणूनच तो राधेय म्हणून ओळखला जातो.

अशाप्रकारे संपूर्ण जगाचे पालनपषण करणारे श्रीविष्णू किंवा श्रीराम श्रेष्ठ आहेत. प्रत्यक्ष पार्वती म्हणजे शैलजा आणि शूलपाणी म्हणजे भगवान शंकर हे देखील त्याचे स्मरण करतात एवढा तो श्रेष्ठ आहे. रामनामाचा महिमा प्रत्यक्ष शंकर पार्वतीला वर्णन करून सांगतात. तेव्हा महापराक्रमी, महाबलशाली आणि सर्व गुणांनी संपन्न असलेला हा भगवंत आपल्या दासाची कधीही उपेक्षा करीत नाही. हे लक्षात घेऊन आपणही त्याचेच स्मरण नित्य केले पाहिजे.

स्वसंवाद : 

१) देवांनाही संकटे येतात आणि ते परमेश्वराचा आश्रय घेतात मग मी माझ्या संकटात त्याचा आश्रय घेण्यास का संकोचतो?

२) पालनकर्ता हा जन्म देणाऱ्यापेक्षा श्रेष्ठ असतो मग माझे खरे पालन करणारा कोण आहे हे मी ओळखले आहे का?

३) प्रत्यक्ष शंकर-पार्वती रामाचे स्मरण करतात. माझ्या दिनक्रमात त्याचे स्मरण कितीपत होते?

४) भगवंत “आगळा सर्वगुणें” आहे. माझ्या जीवनात मी कोणत्या गुणांचा आदर्श त्याच्याकडून घेतो आहे?

– – – – 

श्लोक करा. ३२ – – – 

अहिल्या शिळा राघवे मुक्त केली

पदी लागता दिव्य होऊन गेली |

जया वर्णिता शीणली वेदवाणी |

नुपेक्षी कदा राम दासाभिमानी |३२|

अर्थ : श्रीरामांच्या पदाचा स्पर्श होताच शिळा झालेली शापित अहिल्या मुक्त झाली. त्यांच्या पदस्पर्शाने तिचा उद्धार झाला. अशा या भगवंताचे वर्णन करताना वेद सुद्धा शीणले आहेत म्हणजे थकले आहेत किंवा त्याचे वर्णन ते करू शकत नाहीत. असा हा अहिल्येचा उद्धार करणारा भगवंत आपला देखील उद्धार केल्याशिवाय राहणार नाही.

विवेचन : या श्लोकांमध्ये समर्थ भगवंताच्या पराक्रमाचे आणि गुणांचे वर्णन करत आहेत आणि आपल्या भक्तांना तो कशाप्रकारे तारतो हेच यातून आपल्या मनावर ठसवत आहेत. आधीच्या श्लोकामध्ये भगवान रामाने रावणाच्या बंदिवासात असलेल्या देवांना मुक्त केले असे समर्थांनी सांगितले. या श्लोकात श्रीरामांच्या पदस्पर्शाने अहिल्येचा कसा उद्धार झाला ही गोष्ट ते आपल्याला सांगत आहेत.

अहिल्या ही गौतम ऋषींची पत्नी अत्यंत रुपवती आणि शीलवती होती तसेच ती महान साधवी आणि पतिव्रता होती इंद्र तिच्या सौंदर्यावर मोहित झाला आणि गौतम ऋषींचे रूप घेऊन त्यांच्या आश्रमात आला. परंतु काही कथांनुसार इंद्राने तिचे शीलभ्रष्ट करण्याआधीच अहिल्येने त्याला ओळखले आणि तो परत फिरला. तर काही कथांनुसार इंद्राच्या कृत्याला ती बळी पडली आणि तिचे पातिव्रत्य भंग झाले असे म्हटले जाते. याच सुमारास गौतम ऋषी आपल्या आश्रमात परत आले आणि त्यांना अहिल्येच्या पातिव्रत्यावर संशय आला आणि त्यांनी तिला तू शिळा होऊन पडशील असा शाप दिला. वास्तविक हे सगळे जे काही घडले यात अहिल्येचा काहीही दोष नव्हता.

खरंतर मूळ वाल्मिकी रामायणात गौतम ऋषींनी अहिल्येला शाप दिल्याची आणि ती शिळा होऊन पडल्याची नोंद नाही. तुलसी रामायणात आणि इतरही अनेक ठिकाणी मात्र ही कथा सांगितली गेली आहे.

समर्थांनी मूळ वाल्मिकी रामायणाचा बारकाईने अभ्यास केला होता. अशा प्रकारची घटना त्यात नाही हे माहीत असताना देखील ते या ठिकाणी त्या घटनेचा उल्लेख करतात. त्याचे कारण म्हणजे ही घटना सर्वांनी स्वीकारली आहे. दुसरी म्हणजे ती रामाची महती सांगणारी आहे. समर्थांचे आराध्य दैवत श्रीराम असल्यामुळे श्रीरामांची महती सांगणारी कोणतीही गोष्ट असेल तरी त्यांना ती मान्य होते.

श्रीराम हे पतितांना पावन करणारे होते. अहिल्येला इतरांनी जरी शीलभ्रष्ट मानले तरी श्रीरामांनी तिचा तिरस्कार कधी केला नाही. आणि तिला आपल्या पदस्पर्शाने पावन करून तिचा उद्धार केला. या साध्वीचे नाव अत्यंत आदराने पाच पतिव्रतांमध्ये घेतले जाते.

अहिल्या द्रौपदी सीता तारा मंदोदरी तथा 

पंचकन्यां स्मरे नित्यं महापातकनाशनं 

तेव्हा जो भगवंत शिळा झालेल्या अहिल्येचा उद्धार करतो, तो आपला सुद्धा उद्धार करेल हा विश्वास समर्थ आपल्याला या ठिकाणी देतात. पतितांना पावन करणारा असा हा भगवंत आहे त्याच्या पराक्रमाचे आणि गुणांचे वर्णन करण्यासाठी वेद सुद्धा कमी पडतात. त्याचे गुण वर्णन करताना ते थकतात. अशा या परमेश्वराची भक्ती जर आपण मनापासून केली तर तो आपलाही उद्धार केल्याशिवाय राहणार नाही अशी ग्वाही या ठिकाणी समर्थ आपल्याला देतात. म्हणून प्रत्येकाने एकाग्रतेने आणि मनापासून श्रीरामांची भक्ती करावी. मग तो आपल्याबरोबर प्रत्येक प्रसंगी सोबत राहील. संत तुकारामांना असा अनुभव आला होता म्हणूनच ते ” जेथे जातो तेथे तू माझा सांगाती असं म्हणतात. “

स्वसंवाद ::

१) अहिल्येचा दोष नसताना तिला शाप मिळाला. माझा दोष नसताना माझ्या आयुष्यातही असे अन्यायकारक प्रसंग आले तर माझी परमेश्वरावरील श्रद्धा टिकून राहते का?

२) श्रीरामांनी इतरांनी तिरस्कारलेल्या अहिल्येचा स्वीकार केला. मी माझ्या जीवनात अशा उपेक्षित व्यक्तींशी कसा वागतो?

३) “जेथे जातो तेथे तू माझा सांगाती” अशी माझ्या दैनंदिन व्यवहारात मला भगवंताची सोबत जाणवते का 

– क्रमशः श्लोक ३१ आणि ३२.

© श्री विश्वास देशपांडे

चाळीसगाव

प्रतिक्रियेसाठी ९४०३७४९९३२

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ श्री रविंद्रनाथ टागोर यांची “गीतांजली”… भाग – २१ ☆ डॉ. शोभना आगाशे ☆

डॉ. शोभना आगाशे

? इंद्रधनुष्य ?

☆ श्री रविंद्रनाथ टागोर यांची “गीतांजली”… भाग – २१ ☆ डॉ. शोभना आगाशे ☆

श्री रविंद्रनाथ टागोर  

निसर्गातील विविधता, आकर्षकता, चकित करणारे बदल जे क्षणोक्षणी, दिवसा रात्री, ऋतुनुसार, भौगोलिक परिस्थिती नुसार वेगवेगळे व बऱ्याचदा अनपेक्षित असतात, नेत्रसुखद असतात, मानवाच्या बुद्धीच्या, शक्तीच्या पलिकडचे असतात. हे बदल अनुभवताना साहजिकच ही निसर्ग निर्मिती करणाऱ्या शक्ती पुढे आपण नतमस्तक होतो. ‘हे असं का’ हा प्रश्न आपल्याला पडतो तसा तो टागोरांना देखील पडतो. पण आपण त्याची शास्त्रीय, भौगोलिक कारणं शोधण्याचा प्रयत्न करतो पण टागोरांचे हळुवार कवी मन वेगळाच विचार करतं ज्याने आपण चकित होतो.

हे सगळं नेमकं असंच का आणि कसं? म्हणजे फुलात इतके रंग का? फुलांमध्ये मकरंद का? फळात गोड रस का? समुद्राच्या लाटांना गाज का? पानांना सळसळ का? याची उत्तरं त्यांना लहान मुलांकडे पाहिल्यावर मिळतात. या सगळ्या गोष्टींचा संबंध लहान मुलांच्या आनंदाशी असल्याचा त्यांना साक्षात्कार होतो म्हणजे अचानकच हा विचार त्यांच्या मनात चमकून जातो आणि मग त्यांच्या कवी मनाला त्यातली सगळी संगती उलगडत जाते. आणि या कविता वाचल्यावर आपल्याला पूर्णपणे पटतं की, “जे न देखे रवी, ते देखे कवी”

ते म्हणतात, रंगीत वस्तू बघितली की मुलांना खूप आनंद होतो म्हणून देवानं निसर्गात रंग निर्माण केले. गोड खाऊ मिळाला की मुलं खुश होतात म्हणून त्यानं मकरंद निर्माण केला, फळांमध्ये निरनिराळे रस निर्माण केले. मुलांना गाणी खूप आवडतात त्यावर ती आपसुकच नृत्य करायला लागतात. त्यासाठीच देवानं सूर निर्माण केले, पानांच्या सळसळीतून, समुद्राच्या लाटांमधून! निसर्गाची कोमलता आणि लहान बाळाची कोमलता यात काही नातं असलं पाहिजे असं टागोरांना वाटतं.

त्यांना असेही कांहीं प्रश्न पडतात की लहान मुलाच्या पापणीत नीज कुठून येत असेल? किंवा झोपेत बाळ कां हसत असेल? बाळाच्या अंगाची मऊ, लुसलुशीत, टवटवी कशी निर्माण होत असेल? ह्या सगळ्या प्रश्नांची उत्तरे टागोरांना निसर्गात सापडतात. याबाबतीत तर त्यांच्या कल्पना भन्नाट आहेत. आपण अशा कल्पना करूच शकणार नाही.

रानात, काजव्याच्या प्रकाशात, लाजाळूच्या दोन कळ्या डुलत असतात; तिथून नीज येते आणि बाळाची पापणी चुंबून जाते.

तसंच शरदामध्ये चंद्राचे किरण पावसाळी मेघांना स्पर्श करतात आणि त्यामुळे दंव पडतं. या दंवाच्या वर्षावामध्ये उषा नहाते. त्यावेळी तिला स्वप्न पडतं. त्या स्वप्नात बाळाचं झोपेतलं हास्य जन्म घेतं. आणि मग उषा काय करते, ते हास्य अलगद बाळाच्या गालावर ठेवते.

मऊ लुसलुशी मात्र त्यांच्या मते आईच्या तारुण्यात, तिच्या हृदयातल्या हळुवार प्रेमातूनच निर्माण होते आणि ती बाळाला गर्भातच मिळते. आहेत ना कधी न ऐकलेल्या कल्पना!

टागोरांचं मन किती संवेदनशील असेल की, त्यांना इतक्या नाजूक हळुवार कल्पना सुचाव्यात!

अशा निसर्गाची स्तुती करणं, भक्ती करणं, त्याच्यात एकरूप होऊन जाणं, हे सुद्धा सृजनाच्या निर्मिती मागचं अध्यात्मच आहे. यातून एक जाणवतं ना की, परमात्म्याच्या अस्तित्वाची जाणिव होण्यासाठी कुठल्याही अध्यात्मिक अनुभवाची गरज नाही फक्त या लहान मुलांमध्ये समरस झालात की तुम्हाला त्यांच्यातच देव दिसतो, निसर्ग दिसतो. आणि आपण त्या निर्मात्यासमोर नतमस्तक होतो.

—–

गीत : ६१

THE sleep that flits on baby’s eyes does anybody know from where it comes? Yes,

there is a rumour that it has its dwelling where, in the fairy village among shadows of the 

forest dimly lit with glow-worms, there hang two timid buds of enchantment. From there it comes to kiss baby’s eyes.

The smile that flickers on baby’s lips when he sleeps does anybody know where it was born? Yes, there is a rumour that a young pale beam of a crescent moon touched the edge of a vanishing autumn cloud, and there the smile was first born in the dream of 

a dew-washed morning the smile that flickers on baby’s lips when he sleeps.

The sweet, soft freshness that blooms on baby’s limbs does anybody know where it was hidden so long? Yes, when the mother was a young girl it lay pervading her heart in 

tender and silent mystery of love the sweet, soft freshness that has bloomed on 

baby’s limbs.

—–

मराठी भावानुवाद : गीत: ६१

*

तान्हुल्याच्या पापणीत नीज,

कुठून येते बाई?

*

रानाच्या सावली, परीच्या त्या देशी,

लुकलूकणाऱ्या काजव्या प्रकाशी,

लाजाळूच्या दोन कळ्या डुलती गं

नीज येई तेथून चुंबाया पापणी गं॥

*

ओठांवर हसू, झोपेत पिल्लूच्या,

कुठून येते बाई?

*

शारदी मेघा, रश्मी चंद्राची स्पर्शी

उषाही नाहते, त्या दहिवर वर्षी

झोपेतले हास्य, जन्मे स्वप्नी तिच्या

अलगद ठेवी, ते गाली सानुल्याच्या॥

*

गात्रात बाळाच्या, मऊलुस टवटवी, कुठून येते बाई?

*

मखमाली तारुण्या, प्रवेशते आई

हळुवार प्रीती, गात्रे भारून जाई

तीच मिळे बाळा, गर्भात असता

धन्य होते आई, रूप देखणे पाहता॥

*

भावानुवाद © शोभना आगाशे

संपर्क: ९८५०२२८६५८

——

गीत : ६२

WHEN I bring to you coloured toys, my child, I understand why there is such a play of colours on clouds, on water, and why flowers are painted in tints when I give coloured 

toys to you, my child.

When I sing to make you dance I truly know why there is music in leaves, and why waves send their chorus of voices to the heart of the listening earth when I sing to make you dance.

When I bring sweet things to your greedy hands I know why there is honey in the cup of 

the flower and why fruits are secretly filled with sweet juice when I bring sweet things to your greedy hands.

When I kiss your face to make you smile, my darling, I surely understand what the 

pleasure is that streams from the sky in morning light, and what delight that is which the 

summer breeze brings to my body when I kiss you to make you smile.

—–

मराठी भावानुवाद : गीत: ६२

*

नभांत रंगबावरे इंद्रधनू कां?

फुलांत इतुक्या रंगछटा कां?

*

रंगीत खेळणी तुजसाठी आणतो,

तेंव्हा कळते!

*

पर्णांची सळसळ गीत गात कां?

लाटांची गाज धरणी ऐकत कां?

*

मम गीतावर तव नृत्य पाहतो,

तेंव्हा कळते!

*

मधुघट भरले पुष्पहृदी कां?

फळात मधुरस भरे कोण कां?

*

गोड खाऊ तुजसाठी आणतो,

तेंव्हा कळते!

*

प्रभात किरणे सुखवित जग कां?

वातझुळुक शांतवित तनमन कां?

*

तव भाल चुंबितो अन् तू हसतो,

तेंव्हा कळते!

*

निसर्ग निर्मिता जे सुख हरीला

तेच लाडक्या मिळते मजला!

*

भावानुवाद © शोभना आगाशे

संपर्क: ९४५०२२८६५८

—–

गीत : ६३

THOU hast made me known to friends whom I knew not. Thou hast given me seats in 

homes not my own. Thou hast brought the distant near and made a brother of the stranger.

I am uneasy at heart when I have to leave my accustomed shelter; I forget that there abides the old in the new, and that there also thou abidest.

Through birth and death, in this world or in others, wherever thou leadest me it is thou, the same, the one companion of my endless life who ever linkest my heart with bonds of joy to the unfamiliar.

When one knows thee, then alien there is none, then no door is shut. Oh, grant me my prayer that I may never lose the bliss of the touch of the one in the play of the many.

—–

मराठी भावानुवाद : गीत:६३

*

अपरिचित जागी जन्मा घालिसी 

अनोळखींना भाऊ बनविसी

*

बेचैन मन हे तिथेच गुंती

सोडूनि जाता नाती गोती

*

नव्यात जुनेही सारे वसते

अस्तित्व तुझे सोबत असते

*

अनंत जन्म साथ तू देशी

अन् प्रेमबंध तू नवे निर्मिशी

*

जे तुला जाणती, परके नसती

त्यांच्यासाठी सारी दारे खुलती

*

एकच वर दे, जाईन जेथे

अनेकात तू एकचि तेथे

*

– क्रमशः भाग २१..

मूळ इंग्लिश काव्य : श्री. रविंद्रनाथ टागोर.

भावानुवाद : कवयित्री : © शोभना आगाशे

सांगली 

दूरभाष क्र. ९८५०२२८६५८

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ समर व्हेकेशन मेमरीज… – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – सौ. गौरी गाडेकर ☆

सौ. गौरी गाडेकर

📖 वाचताना वेचलेले 📖

समर व्हेकेशन मेमरीज… – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – सौ. गौरी गाडेकर

उशिरा उठायचं,

आईच्या कामात लुडबुड करायची,

उठल्या उठल्या कॅरम काढायचा,

मित्र मैत्रिणींना बोलावून आणायचं,

सटर फटर काहीतरी खात राहायचं,

कैरीच्या फोडी पळवायच्या,

मधूनच ताट भरून कलिंगडाच्या फोडी यायच्या,

मग कधीतरी जमलं तर अंघोळ,

मग रस काढून उरलेल्या कोयी आणि सालं चोखायची,

पत्त्यांचे डाव, खाऊ, कुल्फीची घंटा,

चार आण्याची की आठ आण्याची कुल्फी आणायची ह्यावर चर्चा,

कॅरम आणि पत्त्याचे उधळलेले डाव,

कुणीतरी लायब्ररीमधून आणून दिलेली एकट्याने बसून वाचलेल्या विक्रम वेताळ, चम्पक, चांदोबा, किशोर पुस्तकं,

एक रुपया तासावर भाड्याने आणलेली सायकल,

भाड्याने आणलेला व्ही. सी. आर. ,

खराबलेल्या कॅसेट्स्,

मग चुलत, आत्ते, मामे, मावसभावा– बहिणींबरोबर एकमेकांकडे राहायला जाण्याचा प्लॅन,

भीत भीत पोहोण्याच्या तलावावर जाऊन कशीबशी संपवलेली ती ४० मिनिटं,

संध्याकाळी बागेत गेल्यावरचा तो भेळेतल्या कांदा कोथिम्बिरीचा आणि पाणी पुरीचा एकत्रित वास,

सगळ्या नातेवाईकांकडे दोन- चार, दोन-४ चार दिवस करून घालवलेली अख्खी सुट्टी,

काहींच्या अगदी बेताच्या परिस्थितीतही केलेले लाड,

कोपरापर्यंत जाणारा आमरसाचा ओघळ,

सगळ्या शर्ट्सना पडलेले रसाचे डाग,

पापड कुरडयाची वाळवणं आणि त्या पळवणं

पहाटे उठून क्रिकेट खेळणे,

एखादा सिनेमा,

ह्या सगळ्यामध्ये ताण म्हणावा म्हणजे अगदी नगण्य असं रिझल्टचं टेन्शन,

तो साधेपणा गेला. आता एवढ्या कुठल्याच साध्या गोष्टीत मन रमत नाही. खूप जास्त काहीतरी entertaining – happening लागतं. छान सुट्टी असायची….. पण संपून गेली……

खरच रम्य ते बालपण….. परत जाता येईल का हो भूतकाळात…?

Missing all..

 

लेखक : अज्ञात

प्रस्तुती : गौरी गाडेकr

संपर्क – 1/602, कैरव, जी. ई. लिंक्स, राम मंदिर रोड, गोरेगाव (पश्चिम), मुंबई 400104.

फोन नं. 9820206306

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – प्रतिमेच्या पलिकडले ☆ # माझं गं ते लेकरू… # ☆ श्री नंदकुमार पंडित वडेर ☆

श्री नंदकुमार पंडित वडेर

? प्रतिमेच्या पलिकडले ?

☆ # माझं गं ते लेकरू… # ☆ श्री नंदकुमार पंडित वडेर 

आता माझ्यापासून जरा देखील तुला दूर ठेवणार नाही समजलं…

त्या शहराच्या कचऱ्याच्या कोंडाळ्यात तुला पडलेला.. पाहीला…

छे.. छे.. तुला तिथे कुणी टाकून दिला होता…

कदाचित तुझा कंटाळा आला असावा वा तुझ्यापेक्षा अधिक चांगला टेडी त्यांनी घरी आणला असणार. मग तुला अडगळीत ठेवण्यापेक्षा… तुला तिथून काढून तुझ्या रिकाम्या जागेवरच त्या नव्याला बसवले असणार… अशीच असते दुष्ट निर्दयी दुनियेची रीत बरं का माझ्या लेकरा…

मी तुला त्या कचऱ्याच्या कोंडाळ्यात उदासपणे पडलेला पाहून माझं मातेचं मन द्रवलं बघं… मला राहवलं नाही आणि तो कचरा तिथून हलवण्याच्या आधीच मी तुला तिथून उचललं… माझ्यातल्या मातृत्वाचा पान्हा वाहू लागला… तुला बघितलं हातात घेतलं आणि खरं सांगायचं तर तिथंच तुला छातीशी कवटाळून घेतलं… होय तू माझा आहेस आणि मी तुझी माय आहे… तिथं दुसरं कुणी येऊन माझ्यापासून तुला हिसकावून घेऊन नये याची मी खबरदारी घेत राहिले…

किती सुंदर आणि गुबगुबीत लेकरू माझं… हो आता ते माझ्या कुशीत आहे म्हणजे माझचं झालं नाही का..

कसं काय दगडाचं काळीज असतं एकेकाचं.. या निरागस, निष्पाप लेकराला असं उघड्यावर आणि असल्या घाणेरड्या उकिरड्यावर टाकायचं धाडस कसं होतं म्हणते मी… त्या लेकराचा काय दोष आहे बरं त्यातं…

माझ्या दृष्टीला ते पडलं म्हणून बरं झालं अन्यथा जरा जरी उशीर झाला असता तर कुत्र्या मांजरांनी, कावळ्या गिधाडांनी त्याचे लचकेच तोडले असते….

पण नियतीची लिला अजब असतेच हेच खरे… आता हेच बघाना गेली कित्येक वर्षे मला मातृत्वाची इच्छा होती… पण नियतीने माझ्या नशिबी वांझपणाचा शिक्का कायमचा कोरला असल्याने मला ते सुख कधीच मिळणारं नव्हतं… पण म्हणून काही माझ्या मध्ये असलेलं मातृहदयाची अमृतमय भावना अंत:करणात वसलेली होती तिचं काय.. तिला सारखं वाटायचं आपण असं प्रकट कधी होणार, कधी उफाळून येणार याच्या प्रतिक्षेत होती… मी इतरांच्या लेकरांवर खूप खूप माया, प्रेम भरभरून केले अगदी समरसून स्वताचं असल्यासारखे… पण शेवटी ते दुसऱ्याचं आहे उपरं आहे याच्या मर्यादा आल्या नि माझं मनं व्यथित व्हायचं.. आपली कुस उजवली नाही, वांझोटी म्हणून हेटाळणी झाली… एका स्त्रीच्या अंतकरणाच्या नि तिच्या जगण्याच्या चिंध्या चिंध्या केल्या… काही तिची म्हणणाऱ्या घरातल्या माणसांकडून नि त्या ढोंगी, मतलबी समाजाकडून… माझं अपत्यहिनाचं दुख त्यांनी समजून घेण्याचा कधीच प्रयत्न केला नाही… आणि या उदासीन, नैराश्याच्या वेळी मला तू दिसलास… मला माझ्या जीवनाची नवी वाट गवसली..

मी तुला आता चांगलं पालनपोषण करीन… तुझ्यावर माझ्यात इतके दिवस दडलेला मातृत्व नि वात्सल्याचा मायेचा झऱ्यात आकंठ बुडवून ठेवेन… तुला कुठे ठेवू आणि कुठे नको असं झालयं बघ माझं…. तुझ्यासाठी आता कितीतरी कष्ट उचलण्याचं बळं आलयं बघ माझ्यात… आता तू आणि मी.. मी आणि तू बस्स मला आता इतर जगाची जरूरी नाही… तू मिळालास आणि माझ्या स्वप्नांची परिपूर्तता झाली….

इतरांना काय म्हणायचं ते खुशाल म्हणोत… या वेडीला खेळण्यातील निर्जीव टेडीला आपलं लेकरू समजून आपल्या मातृत्वाची हौस भागवतेय कशी बघा…

हो हो आहेच मी वेडी… एका वांझ असलेल्या स्त्री ला मातृहदय नसते असं का बरं तुम्हाला वाटत… आणि हे एक निर्जीव खेळणं आहे याची कल्पना मला नसावी इतकी ही मी वेडी नाही… पण म्हणून काही सलणारं सत्य जीवनभर कवटाळून बसण्यापेक्षा जे दिसतयं त्या समोर तरी त्यावर भरभरून आपल्या मातृत्वाचा, मायेचा वात्सल्याचा झरा असा झरझर वाहू दिला तरी या माझ्या वैराण वाळवंटी जिवनात आभासी का होईना पण आनंदाची हिरवळ नाही का फुलणार! …

©  श्री नंदकुमार इंदिरा पंडित वडेर

विश्रामबाग, सांगली

मोबाईल-99209 78470 ईमेल –nandkumarpwader@gmail.com

≈ संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ “१ मे : जागतिक कामगार दिन आणि महाराष्ट्र दिन” ☆ श्री जगदीश काबरे ☆

श्री जगदीश काबरे

☆ “१ मे : जागतिक कामगार दिन आणि महाराष्ट्र दिन☆ श्री जगदीश काबरे ☆

१ मे हा दिवस जगभरात ‘आंतरराष्ट्रीय कामगार दिन’ म्हणून साजरा केला जातो. या दिवसाची मुळे एकोणिसाव्या शतकाच्या उत्तरार्धात अमेरिकेतील कामगार चळवळीत रुजलेली आहेत. तेव्हाच्या औद्योगिक क्रांतीच्या लाटेत कारखानदार आणि भांडवलदार वर्गाने कामगारांना अक्षरशः यंत्राप्रमाणे राबवले होते. दिवसाचे चौदा ते सोळा तास काम, अत्यल्प वेतन, असुरक्षित कामाची परिस्थिती आणि बालमजुरी हे त्या काळाचे भयाण वास्तव होते. या पार्श्वभूमीवर अमेरिकेतील ‘अमेरिकन फेडरेशन ऑफ लेबर’ने १८८४ साली एक ऐतिहासिक ठराव केला. त्यानुसार १ मे १८८६ पासून आठ तासांचा कामाचा दिवस लागू करण्याची मागणी केली गेली. या मागणीसाठी शिकागो शहरात हजारो कामगार रस्त्यावर उतरले. ४ मे १८८६ रोजी हेमार्केट चौकात एक प्रचंड मोठी सभा भरली होती. त्या वेळी अज्ञात व्यक्तीने बॉम्बस्फोट केला, पोलिसांनी गोळीबार केला, आणि अनेक कामगार तसेच पोलीस अधिकारी ठार झाले. या घटनेला ‘हेमार्केट हत्याकांड’ असे म्हणतात. या घटनेनंतर जगभरातील कामगार चळवळींना एक तीव्र आवेग मिळाला आणि कामगारांच्या हक्कांसाठीचा लढा अधिक व्यापक झाला. १८८९ साली पॅरिस येथे भरलेल्या ‘दुसऱ्या आंतरराष्ट्रीय कामगार परिषदे’त १ मे हा दिवस जागतिक कामगार दिन म्हणून पाळण्याचा निर्णय घेण्यात आला. तेव्हापासून जगभरातील कामगार संघटना, डाव्या विचारसरणीच्या पक्षांनी आणि समाजवादी चळवळींनी हा दिवस मोठ्या उत्साहाने साजरा करण्यास सुरुवात केली. या दिवशी कामगारांचे मोर्चे निघतात, सभा होतात, त्यांच्या हक्कांची चर्चा होते आणि शोषणमुक्त समाजाचे स्वप्न अधिक बळकट केले जाते.

भारतात कामगार दिनाची सुरुवात १ मे १९२३ रोजी मद्रास (आताचे चेन्नई) येथे झाली. ‘लेबर किसान पार्टी ऑफ हिंदुस्तान’चे नेते मलयापुरम सिंगारवेलू चेट्टियार यांनी पहिल्यांदा या दिवसाचा उत्सव भारतात आयोजित केला. त्यानंतर हळूहळू देशभर कामगार दिन साजरा होऊ लागला. महाराष्ट्रात तर हा दिवस अधिकच विशेष आहे. कारण याच दिवशी १९६० साली स्वतंत्र महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली.

स्वातंत्र्यानंतर भारताची भाषिक आधारावर प्रांतरचना करण्याचा प्रश्न ऐरणीवर आला. लोकांची मागणी होती की समभाषिक लोकांचे एकच राज्य असावे, म्हणजे प्रशासन, शिक्षण आणि न्याय यंत्रणा आपापल्या मातृभाषेत राबवता येतील. या मागणीसाठी देशभर चळवळी सुरू होत्या. आंध्र प्रांताने वेगळ्या तेलुगू राज्यासाठी आंदोलन केले आणि पोट्टी श्रीरामुलू यांच्या बलिदानानंतर १९५३ साली आंध्रप्रदेश स्थापन झाले. या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने डिसेंबर १९५३ मध्ये न्यायाधीश फझल अली यांच्या अध्यक्षतेखाली ‘राज्य पुनर्रचना आयोग’ स्थापन केला. या आयोगाने १९५५ मध्ये आपला अहवाल सादर केला. मात्र या अहवालात मुंबई शहराच्या बाबतीत एक अत्यंत वादग्रस्त शिफारस केली गेली. मुंबई हा केंद्रशासित प्रदेश असावा, किंवा मराठी व गुजराती या दोन्ही भाषिकांचे एकत्र ‘द्विभाषिक राज्य’ असावे, असे सुचवण्यात आले. या शिफारशीमागे अनेक राजकीय आणि आर्थिक कारणे होती. त्या काळी मुंबई हे आजच्यासारखेच देशाचे सर्वात मोठे औद्योगिक आणि व्यापारी केंद्र होते. गुजराती भांडवलदार, व्यापारी आणि उद्योजकांचे मुंबईवर मोठे वर्चस्व होते. केंद्रातील काही नेते मुंबई गुजरातला जोडण्याच्या बाजूने होते. मोरारजी देसाई, जे स्वतः गुजरातचे होते, ते तत्कालीन प्रभावशाली नेते होते आणि त्यांनी द्विभाषिक राज्याचा आग्रह धरला. मुंबई महाराष्ट्राला मिळणार नाही असेही जाहीर वक्तव्य केले गेले होते. हा निर्णय मराठी जनतेला अत्यंत अन्यायकारक वाटला आणि त्यातूनच संयुक्त महाराष्ट्र चळवळीला ऊर्जा मिळाली.

संयुक्त महाराष्ट्र चळवळ हे केवळ एक राजकीय आंदोलन नव्हते. ती एक व्यापक सामाजिक, सांस्कृतिक आणि भाषिक अस्मितेची लढाई होती. या चळवळीने महाराष्ट्रातील विविध जाती, वर्ग, समाजगट, कामगार, शेतकरी, विद्यार्थी, साहित्यिक, पत्रकार आणि सामान्य नागरिक यांना एकत्र आणले. मराठी माणसाच्या हृदयात खोलवर रुजलेल्या मातृभाषेच्या आणि मातृभूमीच्या प्रेमाने हे सारे एकत्र आले होते. १९५५-५६ या काळात ‘संयुक्त महाराष्ट्र समिती’ची स्थापना झाली. या समितीमध्ये डाव्या पक्षांच्या कम्युनिस्टापासून ते उजव्या विचारसरणीच्या जनसंघापर्यंत विविध विचारसरणींचे पक्ष सामील झाले. शेतकरी कामगार पक्ष, प्रजा समाजवादी पक्ष, हिंदू महासभा, हे सारे एकत्र आले होते. एरवी एकमेकांशी वैचारिकदृष्ट्या विरोध करणाऱ्या या पक्षांनी मराठी माणसाच्या हक्कासाठी हातात हात मिळवले. हे या चळवळीचे एक अत्यंत महत्त्वाचे वैशिष्ट्य होते. या चळवळीला मराठी साहित्यिक आणि कलाकारांचीही साथ होती. आचार्य अत्रे यांनी आपल्या ‘मराठा’ या वृत्तपत्रातून अत्यंत तेजस्वी आणि प्रखरपणे या चळवळीची बाजू मांडली. त्यांच्या लेखांनी, वक्तृत्वाने आणि व्यंगचित्रांनी जनमत प्रचंड प्रमाणात ढवळले गेले. एस. एम. जोशी, श्रीपाद अमृत डांगे, प्रबोधनकार ठाकरे असे अनेक दिग्गज नेते या लढ्याचे आधारस्तंभ बनले. ही चळवळ मराठी समाजाच्या सामूहिक जागृतीचे प्रतीक होती. ग्रामीण महाराष्ट्रापासून ते मुंबईच्या गिरणगावातील कामगारापर्यंत, आणि पुण्याच्या विद्यापीठातून ते विदर्भाच्या शेतकऱ्यापर्यंत सर्वांची या चळवळीशी नाळ जोडली गेली होती. हे एक खालून वर उठलेले, जनसामान्यांनी उभे केलेले ‘लोकसत्ताक’ आंदोलन होते.

१९५५ ते १९६० या कालखंडात संयुक्त महाराष्ट्राच्या मागणीसाठी मुंबईत अनेक आंदोलने झाली. जनआंदोलन आणि सरकारी दडपशाही यांचा संघर्ष टोकाला पोहोचला होता. या काळात पोलिसांनी आंदोलकांवर गोळीबार केला. या गोळीबारात १०५ निरपराध मराठी नागरिक शहीद झाले. त्यांचे बलिदान व्यर्थ गेले नाही. कारण नंतर त्यांच्या रक्ताने महाराष्ट्राचा नकाशा लिहिला गेला. हे हुतात्मे कोण होते? कामगार, तरुण, विद्यार्थी असलेली ती सामान्य माणसे होती. ते रस्त्यावर उतरले होते, कारण त्यांना आपल्या मातृभाषेचा, आपल्या मुंबईचा आणि आपल्या महाराष्ट्राचा अभिमान होता. मुंबईतील फ्लोरा फाउंटन जवळ असलेल्या हुतात्मा चौकाचे नाव या शहीदांच्या स्मृतीस वाहिले गेले आहे. दरवर्षी १ मे रोजी या चौकात हुतात्म्यांना श्रद्धांजली वाहिली जाते आणि महाराष्ट्र त्यांचे ऋण मानतो. या बलिदानांनी केंद्र सरकारलाही हादरवले. जनतेच्या रोषाची तीव्रता लक्षात घेऊन, आणि या आंदोलनाची व्यापकता पाहून, पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारने आपली भूमिका बदलली. द्विभाषिक राज्याची कल्पना सोडून मुंबईसह महाराष्ट्र आणि स्वतंत्र गुजरात या दोन राज्यांची निर्मिती करण्याचा निर्णय झाला; आणि १ मे १९६० हा महाराष्ट्राच्या इतिहासातील सोनेरी दिवस उगवला. याच दिवशी ‘महाराष्ट्र राज्य पुनर्रचना कायदा १९६०’ अंमलात आला आणि मुंबईसह महाराष्ट्र राज्याचा जन्म झाला. कोकण, देश, विदर्भ, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र या विविध भागांतील मराठी भाषिकांचे एक राज्य झाले. ही केवळ एक प्रशासकीय घटना नव्हती, तर ते मराठी माणसाच्या दीर्घ संघर्षाचे फलित होते.

याच दिवशी जागतिक कामगार दिन असणे हा तर ऐतिहासिकदृष्ट्या अर्थपूर्ण योगायोग आहे. कारण संयुक्त महाराष्ट्र चळवळ ही एका अर्थाने कामगार वर्गाचीच चळवळ होती. मुंबईच्या गिरण्यांमध्ये राबणारा मराठी कामगार, कापड गिरण्यांतील मजूर, बंदरावर काम करणारे मजूर, हे या आंदोलनाचा कणा होते. त्यांच्या घामाने आणि रक्ताने महाराष्ट्र उभा राहिला. यशवंतराव चव्हाण हे महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री बनले. त्यांनी या नव्या राज्याचा पाया घालण्याचे महत्त्वाचे कार्य केले. नव्या महाराष्ट्राचे स्वप्न साकार करणे, विकासाची दिशा ठरवणे आणि विविध जातींना एकत्र बांधणे हे त्यांच्यापुढील मोठे आव्हान होते. महाराष्ट्र हे कृषिप्रधान राज्य असले तरी मुंबईमुळे ते देशाचे आर्थिक केंद्रही राहिले आहे.

महाराष्ट्राची निर्मिती झाली खरी, परंतु ती अपूर्ण होती. बेळगाव, धारवाड, विजापूर, कारवार आदी भागातील मराठी भाषिक प्रदेश कर्नाटकात समाविष्ट केले गेले. हा महाराष्ट्रावरील एक मोठा अन्याय होता आणि आजही हा प्रश्न सुटलेला नाही. बेळगाव शहरात मराठी भाषिकांची संख्या मोठी आहे, तरीही ते कर्नाटकात आहे. या समस्येवर तोडगा काढण्यासाठी ५ जून १९६० रोजी चार सदस्यांची एक समिती नेमण्यात आली. या समितीने ‘पाटसकर फॉर्मुला’ वापरण्याची शिफारस केली. या फॉर्मुल्यानुसार गाव हा घटक मानून, ज्या गावात ५०% पेक्षा जास्त एका भाषेचे लोक राहतात, ते गाव त्या भाषिक राज्याला द्यावे, असे ठरले. मात्र हा फॉर्मुला अमलात आणण्यात अपयश आले. पुढे १९६६ साली माजी सरन्यायाधीश मेहेरचंद महाजन यांची एकसदस्य आयोग नेमण्यात आला. महाजन आयोगाने आपला अहवाल सादर केला ज्यात निपाणी, खानापूर यांसह २६४ गावे महाराष्ट्राला आणि अक्कलकोटसह २२७ गावे कर्नाटकाला देण्याची शिफारस केली. मात्र या आयोगाने बेळगाव महाराष्ट्राला देण्याची शिफारस केली नाही. हे महाराष्ट्राला मान्य नव्हते. त्यामुळे महाराष्ट्र सरकारने महाजन आयोगाच्या शिफारसी एकमुखाने फेटाळून लावल्या. बेळगावचा प्रश्न आजही तीव्र आहे. ‘महाराष्ट्र एकीकरण समिती’ या संघटनेने या लढ्याचे नेतृत्व केले आहे आणि आजही करत आहे. संयुक्त महाराष्ट्राची मोहीम यशस्वी झाल्यानंतर ही समिती थोडी मोडकळीस आली असली तरी ती अजूनही आपले काम करत आहे. बेळगावमध्ये मराठी शाळा, मराठी संस्कृती आणि मराठी अस्मिता जिवंत ठेवण्यासाठी हे कार्यकर्ते अथक परिश्रम करत आहेत. सर्वोच्च न्यायालयात हा प्रश्न विविध याचिकांद्वारे गेला आहे. केंद्र सरकारने वेळोवेळी मध्यस्थी करण्याचे प्रयत्न केले. परंतु कर्नाटक सरकार बेळगाव सोडण्यास तयार नाही. कर्नाटकाने तर बेळगावचे नाव ‘बेलगावी’ असे कन्नड पद्धतीने बदलले आणि तेथे कर्नाटक विधानसभेचे अधिवेशन भरवण्यास सुरुवात केली. या सगळ्यामुळे मराठी मनात संताप आहे.

महाराष्ट्र आज देशातील औद्योगिक आणि आर्थिकदृष्ट्या प्रगत राज्यांपैकी एक अव्वल दर्जाचे राज्य आहे. मुंबई ही भारताची आर्थिक राजधानी आहे. माहिती तंत्रज्ञान, वित्त, मनोरंजन, उत्पादन उद्योग या क्षेत्रांत महाराष्ट्राने देशात आघाडी घेतली आहे. पण या विकासासोबतच मराठी माणसाचे, सामान्य कामगाराचे, शेतकऱ्याचे जीवनमान कसे उंचावेल हा प्रश्न अजूनही समोर उभा आहे. कामगार दिनाच्या निमित्ताने आज हे विचारणे अत्यंत आवश्यक आहे की, ज्या कामगारांनी या राज्यासाठी लढा दिला, ज्यांच्या खांद्यावर मुंबईची आणि महाराष्ट्राची अर्थव्यवस्था उभी आहे, ते कामगार आज किती सुरक्षित आहेत? गिरण्या बंद पडल्या, कामगारांच्या वस्त्या उद्ध्वस्त झाल्या, रोजगाराच्या संधी कमी झाल्या. या प्रश्नांची उत्तरे शोधणे हे महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने औचित्यपूर्ण ठरणारे आहे.

त्या काळी मुंबईतील कापड गिरण्यांमध्ये लाखो मराठी कामगार काम करत होते. ते मूळचे कोकणातून, देशावरून आलेले होते. त्यांनी मुंबई घडवली होती. पण मुंबईत त्यांची गणना ‘परके’ म्हणून होत होती. मुंबई महाराष्ट्राला मिळावी ही त्यांची मागणी केवळ भावनिक नव्हती, तर ती त्यांच्या अस्तित्वाचीही मागणी होती. आपल्या कामाच्या ठिकाणावर आपल्या भाषेत बोलण्याचा, आपल्या संस्कृतीत राहण्याचा हक्क मागणे हे चुकीचे कसे म्हणता येईल? कार्ल मार्क्सने सांगितले होते की कामगार वर्गाला मातृभूमी नसते, परंतु भारताच्या संदर्भात हे सूत्र पुरेसे नाही. येथे भाषा, संस्कृती आणि प्रांत यांचा प्रश्न फक्त वर्गीय प्रश्नाशी गुंफलेला नाही. मराठी कामगाराला त्याची मराठी भाषा, त्याची महाराष्ट्रीय संस्कृती यांच्याशी जोडलेले राहणे आवश्यक होते. या दोन्ही संघर्षांचा — वर्गसंघर्ष आणि अस्मितासंघर्ष — यांचा मिलाफ म्हणजेच १ मे. आचार्य अत्रे, एस. एम. जोशी, डांगे हे नेते एकाच वेळी कामगार हक्कांचे पुरस्कर्ते आणि मराठी अस्मितेचे रक्षक होते. त्यांच्या दृष्टीत या दोन्ही गोष्टी परस्परविरोधी नव्हत्या, तर त्या एकमेकांच्या पूरक होत्या. शोषणमुक्त समाजात भाषिक न्याय असतो, आणि भाषिक न्यायाच्या समाजात वर्गीय शोषण असता कामा नये, हेच सूत्र होते.

आज महाराष्ट्र दिनाचा उत्सव साजरा करताना आपण काही प्रश्नांना सामोरे जाणे आवश्यक आहे. महाराष्ट्रातील शेतकरी आत्महत्या, मराठी माध्यमाच्या शाळांची घसरण, रोजगाराचे प्रश्न, ग्रामीण-शहरी विषमता, भाषेचे राजभाषा म्हणून स्थान काय आहे, हे सारे प्रश्न अनुत्तरित आहेत. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळणे हे एक मोठे यश आहे. पण हा दर्जा कागदावर राहू नये. मराठी शाळा, मराठी विद्यापीठे, मराठी साहित्य संस्था यांना बळ देणे, मराठी तंत्रज्ञान विकसित करणे, हे सरकार आणि समाज दोघांचेही कर्तव्य आहे. ज्या हुतात्म्यांनी महाराष्ट्रासाठी प्राण दिले, त्यांचे स्वप्न साकार करण्यासाठी मराठी समाजाने सतर्क आणि संघटित राहणे गरजेचे आहे. त्याचवेळी बेळगाव आणि सीमाभागातील मराठी जनतेशी एकजूट राखणे हे देखील महाराष्ट्राचे कर्तव्य आहे. त्यांची भाषा, त्यांची संस्कृती, त्यांची शिक्षणाची व्यवस्था जोपासणे, त्यांच्या न्यायासाठी लढा देत राहणे हे संयुक्त महाराष्ट्राची अपूर्ण मागणी पूर्ण करण्याचाच एक भाग आहे.

एवंच संयुक्त महाराष्ट्र चळवळ हा भारतीय लोकशाहीतील एक उज्ज्वल अध्याय आहे. सामान्य माणसांनी संघटित होऊन, बलिदान देऊन, एका अन्यायाविरुद्ध यशस्वी लढा दिला, हे या चळवळीचे सार आहे. हे स्मरण आपल्याला सांगते की लोकशाहीत जागरूक नागरिकांचे सामूहिक बल हे सर्वात मोठे शस्त्र आहे. म्हणूनच प्रत्येक मराठी माणसाने — विशेषतः तरुण पिढीने — या दिवसाचे महत्त्व जाणले पाहिजे. हुतात्म्यांचे स्मरण करणे म्हणजे केवळ श्रद्धांजली वहाणे नव्हे; तर एक जबाबदारी स्वीकारणे आहे. महाराष्ट्राच्या प्रगतीसाठी, मराठी माणसाच्या सन्मानासाठी आणि न्यायपूर्ण समाजाच्या निर्मितीसाठी कायम जागरूक आणि सक्रिय राहणे हेच खरे महाराष्ट्र दिन आणि कामगार दिनाचे फलित असायला हवे.

© श्री जगदीश काबरे

(लेखक विज्ञान आणि वैज्ञानिक दृष्टीकोन प्रसारक आहेत.)

jetjagdish@gmail. com

मो ९९२०१९७६८०

≈ संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ मला समजलेली संत तुकारामांची गाथा… भाग – १८ ☆ सुश्री अरुणा मुल्हेरकर ☆

सुश्री अरुणा मुल्हेरकर

? विविधा ?

☆ मला समजलेली संत तुकारामांची गाथा… भाग – १८ ☆ सुश्री अरुणा मुल्हेरकर ☆

सत्संग- सज्जन प्रशंसा (२)

महाराजांना संतांच्या रूपात  प्रत्यक्ष पांडुरंग दिसतो. त्यांचे म्हणणे असे आहे की, गृहस्थाने देवाची पूजा करत असताना जर घरी कोणी संत मंडळी आली तर पूजा बाजूला ठेवून संतांची यथासांग पूजा करावी. प्रथम त्यांचा आदर करावा मग पूजा करण्यास घेतलेला देव शाळीग्राम असो, नाहीतर प्रत्यक्ष विष्णूची मूर्ती असो. मूर्ती पूजेच्या ऐवजी देवस्वरूप असणाऱ्या संतांचे पूजन हा धर्म आहे.

 धन्य ते संसारी/ दयावंत जे अंतरी/

 येथे उपकारासाठी/ आले घर ज्या वैकुंठी//

 लटिके वचन/ नाही देही उदासीन/

 मधुरा वाणी होटी / तुका म्हणे वाव पोटी//

संत गण, सज्जन, म्हणजे कसे असतात  याचे  वर्णन वरील अभंगात तुकाराम महाराज करतात. या लोकांच्या अंतःकरणात दया असते, म्हणून ते धन्य आहेत. कोणा परक्याला ठेच लागली तरी संतवृत्तीच्या माणसांच्या डोळ्यात टचकन पाणी येते. यांचे वास्तविक वैकुंठ हेच निवासस्थान आहे, परंतु केवळ परोपकार बुद्धीने ही माणसे लोकांमध्ये येतात. ते कधीही खोटे बोलत नाहीत, खोटी वचने देत नाहीत, त्यांची वाणी नेहमी मधुर आणि रसाळच असते. लोकांचे गुणदोष सामावून घेण्याइतके त्यांचे मन मोठे असते. त्यांची वृत्ती क्षमाशील असते. दुसऱ्याचे सुख तेच त्यांचे सुख. स्वतःच्या देहासंबंधी ते पूर्णतः उदासीन असतात.

 अशा संतांचा संग लागणे, यासाठी प्रारब्ध ही अनुकूल असावे लागते, सर्वांनाच संत संगतीचा लाभ होतोच असे नाही.

 जेथे जावे तेथे कपाळ सरिसे/

 लाभ तो विशेष संत संगे//

 पूर्वपुण्य जरी होती सानकूळ/

 अंतराय मूळ नुपजे तेथे//

 भाग्य तरी नव्हे/ धन पुत्र दारा/

निकट वास बरा/ संतापाई//

 तुका म्हणे हेचि करावी मिरासी/

 बळी संतांपाशी द्यावा जीव//

महाराज देवाजवळ एकच मागणे  मागतात की देवा, मला संतांची संगती लाभू दे. त्यांचा असा विश्वास आहे की दैव अनुकूल नसले, तरी संतांच्या सहवासात ते अनुकूल करता येईल. कारण चांगल्या संगतीचा परिणाम चांगलाच होणार. पत्नी, पुत्र,द्रव्य, एकूणच हा एक संसार म्हणजेच भाग्य असा सर्वसामान्यांचा विश्वास असतो,

परंतु महाराजांच्या मते संतांच्या चरणाशी आपण कायम राहावे, त्यांची सेवा करावी, त्यांच्यापाशी जीवही अर्पण करावा, तरच सद्गती लाभेल. दोऱ्यात ओवलेल्या सुगंधी फुलांच्या गंधाने  दोराही सुगंधित होतो.

संत, सज्जन, ज्ञानी माणसांइतके महान कोणी नाही हे तुकाराम महाराज त्यांच्या अनेक अभंगांतून सतत सांगत आहेत. त्याच आशयाच्या या अभंगाचा आपण थोडा विचार करू.

 परमार्थी  तो न म्हणावा आपुला/

 सलगी धाकूला हेळू नये/

 थोडाची स्फुल्लिंग बहुत दावाग्नी/

 वाढता इंधनी वाढविला/

 पितियाने तैसा वंदावा कुमर/

 जयाचे अंतर देव वसे/

 तुका म्हणे शिरी वहावे खापर/

 माजी असे सार नवनीत//

जो कोणी परमार्थी असेल, ब्रह्मनिष्ठ असेल, तो वयाने लहान असला तरी त्याची अवहेलना करू नये. तू लहान आहेस, तुला काय कळतंय असे बोलणे साफ चुकीचे आहे.  वयाच्या सोळाव्या वर्षी ज्ञानेश्वरी लिहून गीतेचे ज्ञान सर्वसामान्यांपर्यंत पोहोचविणारे ज्ञानेश्वर महाराज यांना आपण माऊली म्हणून का बरे वंदन करतो? या ठिकाणी तुकाराम महाराजांनी अगदी योग्य असे दृष्टांत दिले आहेत.

ते म्हणतात की अग्नीची ठिणगी लहान असली तरी लाकडाच्या योगाने मोठ्या अग्नीचे स्वरूप धारण करते. तशी परमार्थाची स्थिती आहे. ज्याच्या अंतःकरणात नित्य देवाची वस्ती असते अशा मुलाला पित्यानेही नमस्कार करावा. लोण्याचे भांडे मातीचे असले तरी डोक्यावरून वाहून नेतात, त्याचप्रमाणे ज्ञानी, वयाने लहान असला किंवा हलक्या कुळातला असला तरी तो वंदनीय आहे. सावता, माळी होता, चोखा, महार होता, नामदेव, शिंपी होता, गोरा, कुंभार होता, परंतु हे सर्व वृत्तीने संत होते, महात्मे होते, म्हणूनच वंदनीय आहेत.

देहरूपी मलीन झालेली चादर कोणत्याही साबणाने स्वच्छ करता येत नाही. संतांच्या सहवासात राहून त्यांच्या वचनानुसार वर्तन करणे हा एकच मलीनता नष्ट करण्याचा उपाय आहे, हे जाणून अत्यंत नम्रतेने तुकाराम महाराज या संत सज्जनांना उद्देशून म्हणतात…….

 पाळीतो वचन/ परी बहु भिते मन/

 करितो पायांशी सलगी/ नये बैसो अंग संगी//

 जोडोनिया कर/ उभे असावे समोर/

 तुका म्हणे संत/ तुम्ही मी बहु पतीत//

मी तुमच्या वचनाप्रमाणे जरी वागत असलो, तरी मला फार भीती वाटते, कारण माझी ती योग्यताच नाही. तुमच्या पंगतीत मी बसू शकत नाही, म्हणून तुमच्या पायाशीच मी बरा. तुमच्यासमोर हात जोडून उभे राहावे हीच माझी योग्यता आहे. अहो संत सज्जन हो, तुम्ही खरोखरच फार थोर आहात, आणि मी पापी आहे. विनम्र बुद्धी असली तरच माणूस मोठा होऊ शकतो हे तुकारामांना या अभंगातून सांगायचे आहे.

संत महिमा इतका मोठा आहे, की तुकाराम महाराज म्हणतात, संतांवर माझा सर्व भार टाकून मी निश्चिंत झालो आहे. संतांनीच मला विठ्ठलाच्या स्वाधीन केले.

  घालुनिया भार राहीलो निश्चिंती/

 मिरविले संती विठोबासी//

 लावूनिया हाता कुरवाळिला माथा/

 सांगितले चिंता/ न करावी//

 कटी कर समचरण साजिरे/

 राहिला मी बरे तीरी उभा//

 खुंटले सायास आणिक या जीवा/

 धरीले केशवा पाय तुझे//

 तुज वाटे आता ते करी अनंता/

 तुका म्हणे संता लाज माझी//|

संतांनी( विठ्ठलाने) माझ्या डोक्यावरून प्रेमाने हात फिरवला, मला कुरवाळले, माझ्या सर्व चिंता दूर केल्या. मला भयमुक्त केले. कमरेवर हात आणि समचरण ठेवून तो माझा विठू भीमेच्या तीरावर उभा आहे. त्याचे पाय धरल्यामुळे माझे सर्व कष्ट नाहीसे झाले. हे अनंता, तुझ्या इच्छेप्रमाणे तू मला जसे ठेवशील तसा मी राहीन कारण माझी लाज राखणारे संतच आहेत.

संतांची संगती आयुष्यात फार महत्त्वाची आहे. संत हेच गुरु आहेत, संत हेच सन्मार्गदर्शक आहेत. गाथेतील अभंगांतून वर्णिलेला संत महिमा, गाथा वाचताना जागोजागी दिसून येतो. मी घडविले ते एक विहंगावलोकन!

क्रमशः… १८

© सुश्री अरुणा मुल्हेरकर 

डेट्राॅईट (मिशिगन) यू.एस्.ए.

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ परि तुझ्यावाचुनि करमेना… भाग – १ ☆ उज्ज्वला केळकर ☆

उज्ज्वला केळकर

??

☆ परि तुझ्यावाचुनि करमेना… भाग – १ ☆ उज्ज्वला केळकर

माझी एक सख्खी मैत्रीण म्हणजे शुभदा साने. तशा आमच्या प्रत्यक्ष गाठीभेटी कमी होतात. पण आठवड्यातून एकदोनदा तरी फोन होतोच. दिलखुलास गप्पागोष्टी होतात. जून-जुलै च्या दरम्यान फोनमधून हमखास विचारणा असते, ‘कुठली कुठली बोलावणी आली…? काय काय झालं? ’… बोलावणी म्हणजे दिवाळी अंकांची बोलावणी… साहित्य पाठवण्याविषयीचं पत्र आणि काय काय झालं, म्हणजे, काय काय लिहून झालं वगैरे… वगैरे… आम्हा मैत्रिणीत सगळ्यांत जास्त आणि सगळ्यात आधी बोलावणी तिला येतात. त्यामुळे हा काळ तिच्या दृष्टीने खुशीचा तसाच व्यस्ततेचाही असतो.

यंदा मात्र थोडंसं वेगळं घडलं. वेगळं म्हणजे काय? तर जूनअखेर अखेरच मला ‘मेहता ग्रंथजगत’ कडून पत्र आलं. फोनवर तसं तिला सांगितलं. ती म्हणाली, ‘हो का? कशावर लिहायचंय? ’ मी म्हटलं, ‘माझा सहचर’… पत्र वाचल्यावर एकदम शाळेच्या दिवसांची आठवण झाली. म्हणजे शाळेत नाही का आपण निबंध लिहीत होतो? ‘माझी आई’, ‘माझी मैत्रीण, दादा, ताई, आजी-आजोबा इ. इ. ’ माझं वाक्य पुरं होण्यापूर्वीच ती म्हणाली, ‘माझा मोत्या… ’ आणि खिदळायला लागली. मग लगेच म्हणाली, ‘गंमत केली ग! पण त्याचा एक गुण आहेच तुझ्या मिस्टरांमध्ये… ’ मी जरा विचारात पडले. म्हणजे माझ्यावरचं त्यांचं वसा वसा ओरडणं तिच्यापर्यंत पोचलं की काय? तशी मी सूज्ञपणे आणि संयमाने मैत्रिणीसमोर युध्दाचे प्रसंग टाळण्याचा प्रयत्न करत असते. तरी पण संगोवांगी तिच्यापर्यंत पोचलं की काय? पण ती गुण म्हणाली… की बदलत्या काळात अनेक बदलांप्रमाणे ‘गुण’ या शब्दाचाही अर्थ बदललाय? क्षणभरात एवढं सगळं माझ्या डोक्यात भिरभरून गेलं. एवढ्यात ती पुढे म्हणाली, ‘आज्ञाधारकपणा… तुमचे मिस्टर खूपच ऐकतात बाई तुमचं… आमच्याकडे नाही बाई असं… ’ मला वाटतं, प्रत्येक नव-याला शेजा-याची बायको जास्त देखणी वाटते, तसं प्रत्येक बाईला दुसरीचा नवरा जास्त शहाणा, समंजस, समतोल विचारांचा, मुख्य म्हणजे तिच्या मुठीत रहाणारा वाटतो. निदान माझा सहचर असा आहे, याबद्दल माझ्या सगळ्या मैत्रिणींची शंभर टक्के खात्री आहे आणि तसं काही नसलं, तरी तसंच आहे, हे इतरांना पटवून देणं माझ्या सहचराला छानच जमतं. म्हणजे, तुलना केलीच तर सृजनाची प्रतिभा माझ्यापेक्षा त्याच्याकडे जास्त आहे. आता ते फक्त लिखाणातून नाही, तर बोलण्यातून, वाणीतून जास्त प्रसवतं एवढंच!

त्यानंतर एकदा आम्ही सगळ्या मैत्रिणी एकत्र जमलो होतो. साहित्यकलेपासून राजकारण… क्रीडेपर्यंत सगळ्या विषयांना पालाण घालून झाल्यावर गप्पांना खरा रंग भरला, तो आमच्या यांना.. आमच्या घरात… आमची मुलं… असं नि तसं सुरू झाल्यावर, आता माझ्या सगळ्याच मैत्रिणींना वाटतं, आमचे हे म्हणजे सद्गुणांचा पुतळा… मग मी म्हणून टाकलं,

‘आमच्या सुखी आणि समृध्द सहजीवनाचं मधुर पक्व फळ

चाखत माखत खातोय आम्ही गेली कित्येक वर्षं…’

‘याचं रहस्य?’ एकीने लगेच टोकलं. म्हटलं,

‘रहस्य कसलं त्यात? आमच्या घरात नेहमीच घडतं माझ्या इच्छेप्रमाणे…’

‘तेच तर आम्ही म्हणतो…’

सगळ्यांनी एकदमच गिल्ला केला.

‘थांबा… थांबा… पुरतं ऐकून घ्या…’

मी त्यांना थांबवत म्हणते.

‘आमच्या घरात नेहमीच घडत माझ्या इच्छेप्रमाणे

जेव्हा एकमत असेल तेव्हा

आणि घडतं त्यांच्या इच्छेप्रमाणे

दुमत असेल तेव्हा…’

क्षणभर त्या गोंधळल्याच. ‘बंडल मारू नका’ त्या एकदमच म्हणाल्या. ‘शप्पथ! ’ मी म्हटलं. हे हे आत्ता म्हटलं ना, ते सुध्दा त्यांचंच म्हणणं आहे. मी आपली कवितेच्या फॉर्ममध्ये त्याची मांडणी केली, एवढंच!

विद्येचे माहेरघर असलेल्या आणि साहित्यिक आणि सांस्कृतिक उपक्रमांचं केंद्रबिंदू असलेल्या पुण्यनगरीतून १९६५ साली, लग्न होऊन मी माधवनगरला आले. गाव सांगलीपासून तीन-चार मैलावर, पण वहातूक व्यवस्था फारशी नव्हती. अधूनमधून येणा-या महामंडळाच्या बसेस किंवा मग टांगे. टू व्हिलर म्हणजे सायकलीच प्रामुख्याने. घराघरात स्कूटर्स दिसायचा काळ अद्याप खूपच दूर होता. त्यामुळे सांगलीला होत असलेल्या कार्यक्रमांचा मला फारसा उपयोग नसे.

घर मोठं होतं. बारा पंधरा माणसं नित्याचीच. येणं जाणंही खूप असे. घरात माणसांचा तसाच कामाचाही खूपच धबडगा असे. गृहस्थाश्रमाच्या रहाटगाडग्यात उठल्यापासून झोपेपर्यंत फक्त काम आणि कामच असे. मन-बुध्दीला, विचार, कल्पनाशक्तीला तसा विश्रामच असे. ‘माय स्पेस’ किंवा ‘माझा अवकाश’ याबद्दल आज जे सातत्यानं बोललं जातं, तो मला त्यावेळी बिंदूतसुध्दा मिळत नव्हता. नाही म्हणायला, गावात ब-यापैकी असलेले वाचनालय आणि महिला मंडळ हे हिरवळीचे तुकडे होते. ‘वंदना’ हे वार्षिक हस्तलिखित मंडळातर्फे निघत असे. त्याचं संपादन, महिला मंडळासाठी बसवायचे कार्यक्रम यातून थोडीफार कल्पनाशक्तीला चालना मिळायची.

मला आठवतंय, मी माझी पहिली कथा ‘वंदना’ हस्तलिखितासाठी लिहिली होती. पण ते सारं कधीमधी. रोजच्या जीवनात माझ्या शिक्षणाशी संबंधित असं काहीच नव्हतं. यामुळे होणारी माझी घुसमट यांच्या लक्षात आली. (आमचा काळ हा, हे अहो… जाहोचा! इकडून तिकडून पुढे एक पाऊल पडलेलं. सर्रास ‘अरे तुरे… चा काळ यायला अजून वीस-पंचवीस तरी वर्षं लागणार होती.) लग्नानंतर दुस-या वर्षी मला बी. एड्. ला जाणार का? म्हणून विचारलं. त्या वेळी शिक्षकी पेशाविषयी आस्था वा आकर्षण म्हणून नव्हे, तर स्वयंपाकघर-माजघर, उंबरठा-अंगण या परिघाबाहेर पाऊल टाकायची संधी मिळणार, म्हणून मी ‘होय’ म्हणून टाकलं. सकाळी कॉलेज, दुपारी पाठ, एवढं सोडून उरलेल्या वेळात घरकाम, त्यामुळे खूप फरफट झाली. पण मजाही खूप वाटली. शारीरिक ओढाताण झाली, तरी मन प्रसन्न, टवटवित राहिलं. कॉलेजमधील विविध कार्यक्रम, पाठाची तयारी यात कल्पकतेला खूप वाव मिळायचा. त्यावेळी जरी मी घराबाहेर पडण्याची संधी एवढ्याच दृष्टीने बी. एड्. कडे पाहिलं असलं, तरी पुढच्या आयुष्यात मला त्याचा खूप फायदा झाला आणि ते करायला सुचवलं होतं माझ्या सहचराने.

– क्रमशः भाग पहिला 

©  उज्ज्वला केळकर 

संपर्क – निलगिरी, सी-५ , बिल्डिंग नं २९, ०-३  सेक्टर – ५, सी. बी. डी. –  नवी मुंबई , पिन – ४००६१४ महाराष्ट्र

मो. 836 925 2454, email-id – kelkar1234@gmail.com 

≈ संस्थापक संपादक –  श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ ज्ञान आणि अनुभव – – ☆ सुश्री सुरेखा चिखलकर ☆

सुश्री सुरेखा चिखलकर

? मनमंजुषेतून ?

☆ ज्ञान आणि अनुभव – – ☆ सुश्री सुरेखा चिखलकर

मानवाच्या आयुष्यात ज्ञान आणि अनुभव हे दोन्ही अत्यंत महत्त्वाचे घटक आहेत.

‘केवळ पुस्तक वाचून, शिकून आपण ज्ञानी होऊ शकतो, पण त्या ज्ञानाचा खरा अर्थ कळण्यासाठी अनुभवाची गरज असते.’ 

– – या वाक्यातील गाभा हाच आहे की, शब्द समजणे आणि त्यांचा अर्थ जाणणे यात फरक असतो.

ज्ञानी व्यक्ती शब्दांचे अर्थ, त्यामागील विचार आणि सिद्धांत समजू शकते. ती अनेक गोष्टी वाचते, ऐकते आणि शिकते. परंतु, अनुभवाशिवाय हे ज्ञान काहीसे अपूर्ण राहते. कारण प्रत्यक्ष आयुष्यात जेव्हा आपण एखादी गोष्ट अनुभवतो, तेव्हाच त्या शब्दांना खरी खोली आणि अर्थ प्राप्त होतो.

– – उदाहरणार्थ;दुःख हा शब्द प्रत्येकाला माहित असतो. पण ज्याने खरोखर दुःख अनुभवले आहे, त्यालाच त्या शब्दाचा खरा अर्थ कळतो. तसेच आनंद, प्रेम, संघर्ष हे शब्दही अनुभवातूनच अधिक स्पष्ट होतात. त्यामुळे अनुभव हे ज्ञानाला पूर्णत्व देतात.

आजच्या काळात अनेक लोक माहितीच्या आधारे स्वतःला ज्ञानी समजतात. पण जीवनातील चढ-उतार, संकटे आणि संघर्ष यांचा अनुभव घेतल्याशिवाय त्या ज्ञानाला खरी किंमत मिळत नाही. अनुभव आपल्याला अधिक संयमी, समजूतदार आणि प्रगल्भ बनवतो. म्हणूनच, आयुष्यात केवळ ज्ञान मिळवण्यावर भर न देता अनुभव घेण्यालाही तितकेच महत्त्व द्यायला हवे. कारण ज्ञान आपल्याला मार्ग दाखवते, पण अनुभव आपल्याला चालायला शिकवतो. आणि या दोन्हींच्या संगमातूनच खरे शहाणपण निर्माण होते.

मित्रांनो काळजी घ्या….

 © सुरेखा चिखलकर

 

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ भगवान बुद्ध : ज्ञान, करुणा आणि मध्यममार्गाचा तेजस्वी दीप… ☆ श्री दिवाकर बुरसे ☆

श्री दिवाकर बुरसे

? इंद्रधनुष्य ?

✦ भगवान बुद्ध : ज्ञान, करुणा आणि मध्यममार्गाचा तेजस्वी दीप… ✦ श्री दिवाकर बुरसे ☆

(भगवान बुद्ध जयंती विशेष)

प्रस्तावना

उद्या १ मे २०२६, शुक्रवार — वैशाख पौर्णिमा. हा दिवस केवळ चंद्राच्या पूर्णतेचा नाही, तर मानवजातीच्या अंतःकरणात प्रकटलेल्या अपूर्व प्रकाशाचा आहे. याच दिवशी भगवान गौतम बुद्धांचा जन्म झाला, याच दिवशी त्यांना ज्ञानप्राप्ती झाली आणि याच दिवशी त्यांनी महापरिनिर्वाण प्राप्त केले, अशी श्रद्धा जगभरच्या बौद्ध परंपरेत रूजलेली आहे . म्हणूनच बुद्ध पौर्णिमा ही करुणा, प्रज्ञा आणि निर्वैरतेचा पवित्र उत्सव मानली जाते.

लुंबिनीचा दिव्य जन्म

इ. स. पू. ५६३ मध्ये नेपाळमधील लुंबिनी वनात क्षत्रिय शाक्य वंशात सिद्धार्थ गौतमांचा जन्म झाला. राजा शुद्धोधन आणि राणी महामाया यांच्या पोटी जन्मलेल्या या बालकाच्या ठायी पुढे जगाला जागृत करणारा बुद्ध पुरुष दडलेला होता. राजसुख, वैभव, सौंदर्य आणि स्नेह यांच्या कुशीत वाढलेला हा राजपुत्र जन्मतःच विलक्षण तेजस्वी होता.

दुःखदर्शनाची जागृती

संसाराच्या राजमार्गावरून फिरताना सिद्धार्थांच्या दृष्टीस चार दृश्ये पडली — जर्जर वृद्ध, रोगाने गांजलेला मनुष्य, मृतदेह आणि संन्यासी. त्या चार दृश्यांनी त्यांच्या जीवनाची दिशा बदलली. सुखाच्या मोहर्‍यांआड दडलेले दुःख प्रथमच स्पष्ट झाले. राजवैभवाचा त्याग करून वयाच्या एकोणतीसाव्या वर्षी त्यांनी गृहत्याग केला; हाच त्यांचा महाभिनिष्क्रमणाचा क्षण.

साधनेचा पथ आणि बुद्धत्व

कठोर तपश्चर्या, उपवास, मौन आणि ध्यान यांच्या वणव्यातून त्यांनी सत्याचा शोध घेतला. पण अतिरेकी काया-क्लेशाने मुक्ती मिळत नाही, हे उमगल्यावर त्यांनी मध्यम मार्ग स्वीकारला. बोधगया येथे निरंजना नदीकाठी पिंपळाच्या छायेत ध्यानस्थ होत त्यांनी अंतःप्रकाशाचा अनुभव घेतला आणि सिद्धार्थ गौतम बुद्ध झाले. त्या क्षणी मानवी वेदनेचा अर्थही उलगडला आणि तिच्या निरासाचा मार्गही दिसला.

धम्मचक्राचा पहिला सूर्य

ज्ञानप्राप्तीनंतर बुद्धांनी सारनाथ येथे पाच भिक्षूंना पहिले प्रवचन दिले. तो केवळ उपदेश नव्हता; तो धम्मचक्राचा पहिला फिरता प्रकाश होता. त्या प्रवचनातून संसार, दुःख, कारण, निरोध आणि मार्ग यांचा उलगडा झाला. पुढे बुद्धांचा सारा धम्मप्रवास चार आर्यसत्ये आणि अष्टांगिक मार्गाभोवती फुलत गेला.

बुद्धांचे करुणामय व्यक्तिमत्त्व

बुद्धांचे व्यक्तिमत्त्व केवळ प्रभावी नव्हते, तर अंतर्मनाला शांती देणारे होते. त्यांची मुद्रा स्थिर, त्यांची वाणी गंभीर, त्यांचे नेत्र करुणेने ओथंबलेले आणि त्यांचा सहवास मनात नवी प्रसन्नता निर्माण करणारा होता. ते जिथे जात, तिथे भय निवळे, अहंकार मावळे आणि मनात प्रशांत तेज उमटे. त्यांच्यातील सौंदर्य हे देहाचे नसून चेतनेचे होते; म्हणूनच त्यांचा प्रभाव काळाच्या पलीकडे पोहोचला.

धम्माचा गाभा

बुद्धांचा संदेश अत्यंत साधा, पण अत्यंत गहिरा होता — दुःख आहे, दुःखाचे कारण आहे, दुःखाचा निरोध शक्य आहे, आणि त्या निरोधाचा मार्गही आहे. सत्य, अहिंसा, अस्तेय, अपरिग्रह, ब्रह्मचर्य, सम्यक दृष्टि, सम्यक संकल्प, सम्यक वाणी, सम्यक कर्म, सम्यक आजीव, सम्यक व्यायाम, सम्यक स्मृती आणि सम्यक समाधी — या सर्वांतून त्यांच्या धम्माची उंची आणि शिस्त प्रकट होते.

संघ, परिषदा आणि परंपरा

बुद्धधर्माचा पाया संघशिस्तीवर उभा होता. प्रवेश, आचरण, उपसंपदा, पवज्जा, पत्तिमोक्ख, पवारणा आणि गणतंत्रात्मक संघव्यवस्था यांमधून हा धम्म अधिक संघटित, अधिक शिस्तबद्ध होत गेला. बुद्धांच्या महानिर्वाणानंतर धम्मपरिषदांनी त्यांच्या शिकवणीचे संकलन केले. पुढे हीनयान, महायान आणि वज्रयान हे प्रवाह निर्माण झाले; त्रिरत्न — बुद्ध, धम्म, संघ — हीच श्रद्धेची अमूल्य त्रयी राहिली.

महानिर्वाणाचा क्षण

कुशीनगर येथे वयाच्या ऐंशीव्या वर्षी भगवान बुद्धांनी महापरिनिर्वाण प्राप्त केले. जीवनाच्या शेवटच्या टप्प्यातही त्यांनी शिष्यमंडळींना धम्मावर दृढ राहण्याचा उपदेश दिला. त्यांच्या निधनातही विलक्षण शांतता होती; जणू एक दीपक विझला नाही, तर अधिक व्यापक प्रकाशात विलीन झाला.

अमर वारसा

बुद्धांनी दिलेला संदेश आजही मानवतेला नवा मार्ग दाखवतो. क्रोध, लोभ, मोह, द्वेष यांच्या धुक्यात अडलेल्या जगाला त्यांचे जीवन चिरंतन दिशा देत राहते. त्यांनी सांगितलेला मध्यम मार्ग, करुणेची भाषा आणि अंतःशुद्धीचा आग्रह — हेच त्यांच्या जीवनाचे खरे वैभव आहे. बुद्ध पौर्णिमा म्हणजे त्या दिव्य जीवनाचा, त्या करुणामय दृष्टिचा आणि त्या जागृत प्रकाशाचा उत्सव.

बुद्धं सरणं गच्छामि।
धम्मं सरणं गच्छामि।
संघं सरणं गच्छामि।

🙏🙏🙏

© श्री दिवाकर बुरसे

पुणे

संपर्कः ९२८४३००१२५, ९५५२६२९२४५

≈ संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ ।। श्री नारद उवाच ।। – नारद भक्ति सूत्रे — सूत्र क्र. ७४, ७५, ७६. ☆ श्री संदीप रामचंद्र सुंकले ☆

श्री संदीप रामचंद्र सुंकले

? इंद्रधनुष्य ?

।। श्री नारद उवाच ।। – नारद भक्ति सूत्रे — सूत्र क्र. ७४, ७५, ७६. ☆ श्री संदीप रामचंद्र सुंकले 

।। श्री नारद उवाच ।। 

भक्ति सूत्रे क्र. ७४ आणि ७५ – –

वादो नावलम्ब्य: ||७४||”

बाहुल्यावकाशादनियतत्वाच्च||७५||

अर्थ : भक्ताने वादाचा आश्रय घेऊ नये कारण वादामध्ये मतभिन्नतेला भरपूर वाव असतो आणि केवळ तर्कावर आधारलेले कोणतेही मत अथवा विधान अंतिम सत्य नसते. (म्हणून भक्ताने वादापासून दूर रहावे)

विवेचनजगाच्या प्रारंभापासून सांगणारे व ऐकणारे कोट्यावधी होऊन गेले आहेत, पण वाद विवाद काही मिटले नाहीत. पण ज्या वादांत संशयाचे ढग व वादाची वादळे एकामागे एक अशी असंख्य उठत असतात ते वाद निव्वळ दंभ वाढवितात. म्हणून भक्ताने त्यांच्या मागे न लागता सत्संगातील संवादसुख तेवढे घेत जावे.

सर्व संत सांगतात की वाद टाळावा. जर सर्वांशी चांगले संबंध ठेवायचे असतील तर वाद होण्याची परिस्थिती निर्माण होणारच नाही याकडे लक्ष द्यावे. “व्यक्ती तितक्या प्रकृती” तसेच “जितकी मने तितके विचार” हे सूत्र ध्यानी ठेवून तसे वागायला शिकावे. ज्या गोष्टी आपल्या नियंत्रणात नाहीत, त्या तिथल्या तिथे सोडून द्याव्या, तसेच पूर्व घटना आठवून त्याचा शोक करू नये. साधना करताना वाद विवाद टाळून सद्गुरुंच्या वचनावर पूर्ण विश्वास ठेवून साधन करीत राहावे, योग्यवेळी सद्गुरू खात्रीने कृपा करतात, हा विश्वास बाळगावा.

आपल्याकडे प्रत्येकाच्या घरी छोटेसे देवघर, देव्हारा किंवा एखादया देवाची प्रतिमा तरी नक्की असते. आपण रोज देवाची यथामती पूजा देखिल करतो. आपल्या घरात आपण कसे राहतो? कसे वागतो? आपल्या कुटुंबातील सर्वांशी आपले सबंध कसे असतात? हे सर्व पाहून देवाला आपल्या घरात राहावेसे वाटेल का? याचा गांभिर्याने विचार करण्याची गरज आहे. खरंतर, आपल्या घरात देव राहतो असे वाटण्यापेक्षा आपण देवाच्या घरात (मंदिरात) राहतो असे वाटले पाहिजे आणि आपण तसे वागले पाहिजे. हाच खरा सत्संग होईल.

आपल्याशी संवाद साधल्यामुळे समोरची व्यक्ती अंशत: तरी समृद्ध व्हावी.  किमान तसा आपला प्रयत्न असावा, असे झाले नाही तर आपण आपण निव्वळ वाचाळवीर ठरू. “बोले तैसा चाले…. ” असा आपला प्रयत्न असावा. नेमके आणि मोजके बोलणे हे सुसंवांद होण्यास उपयुक्त ठरते, नाही का? आपण तसे वागण्याचा प्रयत्न करू.

“तीर्थे तीर्थे निर्मलं ब्रह्मवृन्दं।

वृन्दे वृन्दे तत्त्वचिन्तानुवादः॥

वादे वादे जायते तत्त्वबोधः।

बोधे बोधे भासते चन्द्रचूडः॥”

“मतामतांचा गल्बला । कोणी पुसेना कोणाला । जो जे मतीं सांपडला । तयास तेंचि थोर ॥”

(दा. ११. ०२. २५)

दैनंदिन व्यवहार करताना अनेक विचारांची माणसे भेटतात. कधी एका विचाराच्या माणसांची चलती असते तर कधी दुसऱ्या… लोकं जातात पण विचार तिथेच रहातात. अर्थात दोन विचारांमधील वाद तसेच राहतात. अध्यात्मिक क्षेत्रात सुद्धा अनेक वाद (विचार) आहेत. द्वैत-अद्वैत हा तर प्रमुख वाद आहे. त्यानंतर शैव वैष्णव हा सुद्धा एक वाद आहे…. साधकाने या वादात फसू नये असे श्रीसमर्थ आपल्याला सांगतात. कुठे वाद घालायचा आणि तो कुठे थांबवायचा ह्याचे तारतम्य कळले नाही, तर संवाद न होता तो फक्त वाद होतो आणि वादातून काहीही निष्पन्न होत नाही, असे इतिहास सांगतो. अध्यात्म क्षेत्रात तरी मनुष्याने वादविवादाच्या भानगडीत न पडता सद्गुरू आज्ञेचे पालन करावे. एक गुरू आणि एक नाम, एक प्रमाण ग्रंथ इतक्या भांडवलावर मनुष्य आत्मारामाची प्राप्ती करून घेऊ शकतो.

संत्संग आपल्याला देवाकडे काय मागावे हे शिकवितो. म्हणून अर्जुन श्रीकृष्णाला मागतो आणि दुर्योधन श्रीकृष्णाचे सैन्य. आपल्याला नवीन काही शिकायचे असेल तर आपली पाटी कोरी हवी. आपण आपला अभिमान घेऊन देवाकडे गेलो तर देव सांगेल ते कधीच आपल्याला पटणार नाही. संवाद होणारच नाही मग हाती काय लागणार? म्हणून देवळात जाताना पायातील चप्पल आणि डोक्यावरील टोपी काढून जावे असे आपल्याला शिकविले जाते.

|| जय जय रघुवीर समर्थ ||

टीप : अधिक अभ्यास करायचा असल्यास मनाच्या खालील श्लोकांचा अभ्यास अवश्य करावा.

वरील दोन्ही सूत्रांचे सुलभीकरण करून आपल्यापुढे मांडण्याचे कार्य समर्थ रामदास स्वामींनी केले असल्याचे आपल्या लक्षात येईल. मनाच्या श्लोकांत ते म्हणतात,

मना सर्वदा सज्जनाचेनि योगें।

क्रिया पालटे भक्तिभावार्थ लागे॥

क्रियेवीण वाचाळता ते निवारी।

तुटे वाद संवाद तो हीतकारी॥१०८॥

*
जनीं वादवेवाद सोडूनि द्यावा।

जनीं वादसंवाद सूखे करावा॥

जगीं तोचि तो शोकसंतापहारी।

तुटे वाद संवाद तो हीतकारी॥१०९॥

*

तुटे वाद संवाद त्याते म्हणावें।

विवेके अहंभाव यातें जिणावें॥

अहंतागुणे वाद नाना विकारी।

तुटे वाद संवाद तो हीतकारी॥११०॥

*

हिताकारणे बोलणे सत्य आहे।

हिताकारणे सर्व शोधुनि पाहें॥

हितकारणे बंड पाखांड वारी।

तुटे वाद संवाद तो हीतकारी॥१११॥

*

जनीं सांगतां ऐकता जन्म गेला।

परी वादवेवाद तैसाचि ठेला॥

उठे संशयो वाद हा दंभधारी।

तुटे वाद संवाद तो हीतकारी॥११२॥

*

– – – – –   

भक्ति सूत्रे क्र. ७६ – – – 

भक्तिशास्त्राणि मननीयानि तदुद्बोधककर्माण्यपि करणीयानि||७६||

अर्थ : भक्तीविषयक शास्त्राचे मनन करावे आणि भक्तीला सहाय्यभूत होणारी कर्मे करावी.

विवेचन :

“विठ्ठल मात्रा जेणे घ्यावी | तेणे पथ्ये सांभाळावी” असे संत वचन आहे. भक्ति करताना मनुष्याने अधिकाधिक शुद्ध होण्याची अनिवार्यता असते. शुद्ध म्हणजे किती शुद्ध? तर जगात सर्वात शुद्ध आणि पवित्र कोण असेल तर तो एकमात्र भगवंत. त्याच्या इतके शुद्ध होण्यासाठी देहधारी साधकाची देहबुद्धी क्षीण होणे आवश्यक असते. एकदा सद्गुरू श्रीगोंदवलेकर महाराज यांनी आपल्या पट्टशिष्याला अर्थात ब्रम्हानंद बुवांना प्रश्न विचारला की तू तर विद्वान आहेस. वेद, वेदांत यांत पारंगत आहेस. मी कसा तुझा गुरू झालो? आणि नंतर स्वतःच म्हणाले की कदाचित तुझ्यापेक्षा मी कणभर जास्त देहाला विसरलो असेन….! कथेतील भावार्थ इतकाच की देहबुद्धि क्षीण नव्हे, तर पूर्णपणे नष्ट होणे ही साधकाच्या भक्तीचे प्रमाण मानता येईल.

आता ही देहबुद्धि समूळ नष्ट होण्यासाठी आवश्यक त्या आणि तितक्याच शास्त्रांचा किंवा ग्रंथांचा अभ्यास साधकाने करावा. अन्यथा साधक साधक न रहाता शास्त्री होतो आणि पुन्हा कर्मठपणाचा दोष त्याच्या अंगी निर्माण होऊन तो पथभ्रष्ट होऊ शकतो.

श्रीमहाराज म्हणायचे की फार वाचू नये. जितके वाचावे तितके साधकाने आधी आचरणात आणावे, अन्यथा मी इतके इतके ग्रंथ वाचले, इतक्या शास्त्रांचा अभ्यास केला याचा वृथा अभिमान बळावू शकतो.

भक्ति शास्त्र म्हणून समजून घेण्यासाठी एखाद्या ग्रंथाचा अभ्यास करण्यास हरकत नाही. आजपर्यंत अनेक संत महात्मे होऊन गेले. त्यांनी त्यांच्या अनुभवातून अनेक ग्रंथांची निर्मिती केली. त्या सर्वांचे ग्रंथ अभ्यास करायचा म्हटले तर अनेक जन्म घ्यावे लागतील आणि मूळ हेतू मात्र विसरला जाईल. यावर सर्व संतांनी एक उपाय सांगितला. एक गुरू, एक ग्रंथ आणि एक नाम. या तिघांच्या सहाय्याने मनुष्य भगवतांची प्राप्ती करून घेऊ शकतो.

साधकाने आपले प्रत्येक कर्म अशा पद्धतीने करावे की जेणेकरून त्यातून भक्तीची वाढ होईल.

भक्तीच्या अनेक व्याख्या आहेत. त्यातील आपल्याला झेपेल अशी व्याख्या प्रमाण मानावी. मला भावलेल्या दोन व्याख्या इथे देत आहे.

१. “जे जे भेटे भूत। ते ते मानिजे भगवंत।।” (ज्ञाने. 10. 18)

२. प्रपंचात जेवढी आसक्ती | तेवढी भगवंतावर प्रीती || याचे नाव भक्ति”

साधकाने आपल्याला भावणारा ग्रंथ निवडावा आणि त्याचा साक्षेपाने अभ्यास करावा, त्यावर चिंतन, मनन करावे, म्हणजे त्याला पुढील मार्ग आपसूक दिसू लागेल.

जय जय रघुवीर समर्थ

नारद महाराज की जय!!!

– क्रमशः भक्तीसूत्रे – ७४, ७५, ७६..

© श्री संदीप रामचंद्र सुंकले (दास चैतन्य)

थळ, अलिबाग. 

८३८००१९६७६

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares