मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ अहमदनगर जिल्ह्यातील माॅरिशस… ☆ संग्राहक – श्री सुनीत मुळे

? इंद्रधनुष्य ?

☆ अहमदनगर जिल्ह्यातील माॅरिशस… ☆ संग्राहक – श्री सुनीत मुळे ☆

अहमदनगर जिल्ह्यातील मॉरिशस  म्हणजे अकोल्यातील “फोपसंडी” गांव जेथे आजही सुर्योदय 9 वाजता आणि सूर्यास्त 4.30 ला होतो

अहमदनगर जिल्ह्यातील अकोला तालुका म्हणजे निसर्ग सौदर्याचे माहेरघर. भंडारदरा धरण, रंधा फॉल, रतनगड, कळसुबाई शिखर, हरीचंद्र गड, सांदण दरी  हे पर्यटन स्थळे महाराष्ट्राच्या नकाशात पर्यटनाचे माहेरघर म्हणून जनतेला माहीत आहे.पावसाळ्यात हजारो पर्यटक सुट्टीच्या दिवशी येथे भेट देतात. अगदी तासनतास ट्रॅफिक जॅमचा इकडे येतांना अकोला सोडल्यानंतर  अनुभव घ्यावा लागतो.

मात्र  पर्यटकांच्या नजरेतून सुटलेलं व निसर्ग सोंदर्याने भरलेलं प्रति “मॉरिशस” असलेलं हे 1200 लोकवस्तीचे ” फोपसंडी” गांव अकोलेपासून अवघे अंदाजे 40 कि. मी. अंतरावरील अनेक मोठमोठे डोंगर पार करून दरीच्या तळाशी वाड्या, पाड्यावर वसलेलं अतिदुर्गम गांव आहे.

या गांवचा इतिहास ही रंजक आहे. साधारणतः 1925 च्या सुमारास संगमनेर प्रांताचे इंग्रज अधिकारी “फोप” हे  घोड्यावरून जंगलात फिरत फिरत या दरीत उतरले. तेथे त्यांना आदिवासींची वस्ती आढळली. या “पोफला” येथील निसर्ग खूप आवडला.व येथे तो दर रविवारी येऊ लागला. येथे राहण्यासाठी त्यांनी “मांडवी नदीच्या” तिरावरील टेकडीवर त्याचे रेस्ट हाऊस बांधले. तेथून तो वरील चार ही जिल्ह्याच्या सिमेवरील डोंगर,  कोंबड किल्ला (कुंजीर गड),  चोहोबाजूंनी धबधबे  पाहण्याचा आनंद घेत असे. पोफच्या या राहण्याने नंतर या गावाला “पोफसंडी” म्हणू लागले. नंतर त्याचा अपभ्रंश होऊन “फोपसंडी” हे नांव रूढ झाले. ते आजतागायत तसेच आहे.

स्वातंत्र्यानंतर ही 50 वर्षे हे गांव शासनाच्या सर्व सोई सुविधांपासून वंचित होते. अगदी निवडणुकीच्या वेळी ही गाढवावरून 10 कि.मी. मतदान पेट्या नेल्या जात होत्या. 1997 मधील गावातीलच दत्तात्रय मुठे ही व्यक्ती पुणे येथून परत गावांकडे आली. व गांवात  रस्ते, वीज, आरोग्य, शिक्षण, दळणवळण, एस टी इत्यादी सुधारणा घडवून आणण्यासाठी पंतप्रधानांपासून ते तालुका स्तरापर्यंत सतत पत्रव्यवहार केले,पायपीट केली. सर्वात प्रथम गावांत बस येण्यासाठी त्यांनी सरकारदरबारी प्रयत्न केले.शेवटचे हत्यार गावकऱ्यांनी गावातच  सांघिक आमरण उपोषणाबाबतचे हत्यार उपसले. नाईलाजाने अधिकारी वर्गांना गावात  पायी यावे लागले. शेवटी गावांत रस्ते आले, बस आली. 2005 ला गावांत रस्ते, वीज यासाठी स्थानिकांनी श्रमदानाचा मोठा सहभाग उचलल्याचे या योजना इथपर्यंत पोहचू शकल्या. आज गांव 100 टक्के हागणदारी मुक्त दिसून आले. गावांत 10 वी पर्यंत शाळा, आहे. वाड्या वस्त्यांवर सिमेंट रस्ते आहेत. नळयोजना आहेत.अकोले येथून रोज एक मुक्कामी बस येते. गावांत अंगणवाड्या आल्या आहेत. नदीवर, ओढ्यावर बंधारे आहेत.

? अजूनही काय सुधारणा आवश्यक आहे ?

१) गावांत पर्यटनवाढीच्या दृष्टीने प्रयत्न होणे आवश्यक आहे. म्हणजे स्थानिकांना पर्यटनातून रोजगार मिळेल.

२) दळणवळणासाठी रस्ते अजून मोठे व चांगले होणे गरजेचे आहे.

३) येथून माळशेज घाट अवघा 10 कि. मी. अंतरावर आहे. किमान 3 कि. मी. डोंगर फोडून रस्ता केला तर माळशेज अगदी जवळ येईल. व दळणवळण, पर्यटन वाढेल.

४) गावांत बँक येणे आवश्यक आहे.

५) सर्वात महत्वाचे म्हणजे कुठलीही दूरध्वनी सेवा, मोबाईल सेवा, इंटरनेट सुविधा गावात नाही.ते होणे गरजेचे आहे.

६) गावातील दूध दररोज 5 कि.मी घेऊन जावे लागते. त्यासाठी गावातच डेअरी होणे आवश्यक आहे.

या गांवचे अनेक  वैशिष्टये सांगता येतील त्यातील काही प्रामुख्याने खाली देत आहे.

१) अहमदनगर, नाशिक, पुणे, ठाणे जिल्ह्याच्या सीमारेषेवर वसलेले अहमदनगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यातील शेवटचे गांव)

२) पावसाळ्यात तुफान पर्जन्यवृष्टी होत असल्याने अजूनही गावातील बहुतांश आदिवासी गुराढोरांसह पावसाळ्याचे चार महिने गुहेचा आसरा घेतात..

३)) या गावात  सकाळी नऊ वाजता सूर्योदय व संध्याकाळी साडेचार वाजता सूर्यास्त होतो. हा दोन्ही देखावा पर्यटकांनी पाहणे म्हणजे पर्यटकांना  कपिलाषष्टीचा योग होय.

४) पर्यटनाच्या दृष्टीने फोपसंडी परिसरात ” कोंबड किल्ला, भदभद्याचा धबधबा, धुळगडीचा धबधबा, धारीचा धबधबा, कावड्याचा धबधबा, चोहडीचा धबधबा, काजवा महोत्सव, आदिवासी नृत्य, निसर्गसॊदर्याने भरलेला  मानखांदा गायदरा, सानदरी, निखळीचा डोंगर, बाळूबाईचा डोंगर, रांजण्याचा डोंगर, टकोरीची खिंड, वारल्याचा कडा, चारण गडद, दोंड्याची गडद, घोडगडद, केमसावण्याचे पाणी, उंबारले,  अनेक गुहा, तसेच कळमजाई मंदिर, बर्डीनाथ मंदिर, दर्याबाई मंदिर, राणूबाई मंदिर इतके प्रचंड निसर्ग सॊदर्याने भरलेले पॉईंट  येथे पहावयास मिळतात. मात्र त्यासाठी किमान तीन दिवस  पायी भटकण्याची तयारी हवी.

५) या गावचे पाणी पिण्यासाठी अतिशय गोड आहे. तसेच धबधब्याखाली आंघोळ केल्यावर शांपू न लावता ही केस कुरळे होतात.

६) पर्यटकांना राहण्याची, जेवण्याची व पर्यटन घडवून आणण्याची व्यवस्था या गावातीलच फोपसंडीचा कायापालट धडवून आणणारे तथा गाईड श्री.दत्तात्रय हनुमंता मुठे यांचे सह्याद्री दर्शन पथिकालय आहे. मात्र त्यासाठी पर्यटकांना 7218327435, 8669754121, 9850989183 या क्रमांकावर संपर्क साधावा लागेल. वरील मोबाईलला फोपसंडीत रेंज नसल्याने दुसऱ्या गावात आल्यावरच फोन लागतो.त्यामुळे वारंवार फोन लावावा लागेल.

मॉरिशससारखा छोटा देश आज केवळ तिथल्या सरकारने पर्यटन सुविधेवर भर दिल्याने तिथला निसर्ग पाहण्यासाठी जगभरातील लोक तिथे जातात. भारतात ही फोफसंडी सारखे अनेक निसर्ग सॊदर्य असलेली ठिकाणे आज पर्यटकांपासून वंचित असल्याने तेथील जनतेचा विकास खुंटला आहे.तसेच पर्यटक निसर्ग सॊदर्याला मुकले आहे.चला आपण ही पर्यटनासाठी  या निसर्गरम्य व शांतताप्रिय दरीखोऱ्यातील “फोपसंडी” पर्यटन स्थळांना अवश्य भेट द्या.  पर्यटन करून आल्यावर  तेथील सुवासिक तांदूळ, मध, व चुलीवरच्या तांदळाच्या भाकरी, मासवडी, लज्जतदार शेवंती तसेच  गावरान कोंबडीचाही आस्वाद घ्या.

चला तर मग कधी निघताय पर्यटनाला”फोपसंडी”येथे.

संग्राहक – श्री सुनीत मुळे

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ पाऊलखुणा – २ ☆ सुश्री प्रभा सोनवणे

सुश्री प्रभा सोनवणे

? मनमंजुषेतून ?

☆ पाऊलखुणा – २ ☆ सुश्री प्रभा सोनवणे ☆ 

(या लेखमालेचा पहिला भाग अनावधानाने “आत्मसाक्षात्कार” – १ या शीर्षकाखाली प्रकाशित झाला आहे, ही “पाऊलखुणा” नावाची लेखमाला आहे.)

लिंक  >> पाऊलखुणा – १

माझा जन्म माझ्या आजोळी झाला. आजी आजोबांच्या सुंदर बंगल्यात…ते ठाणे जिल्ह्यातील छोटसं टुमदार गाव! मोठ्या भावानंतर झालेलं मी दुसरं अपत्य! भावाचा जन्म वाडा या तालुक्याच्या गावी हॉस्पिटल मधे झाला.

 माझी आजी वाडा या गावातल्या सरकारी दवाखान्याच्या कमिटीवर चेअरपर्सन होती त्यामुळे ट्रेन्ड नर्सला घरी बोलवून आईचं हे दुसरं बाळंतपण आजीनं घरातच केलं! माझ्या जन्माच्या वेळी आजी आजोबा, मामा मावशी आणि माझा सव्वा वर्षाचा मोठा भाऊ इतकी माणसं घरात होती. कार्तिक प्रतिपदेचा, रात्री १२.४७ चा माझा जन्म !  तारीख   २० नोव्हेंबर १९५६ ! माझ्या आईला माझं नाव मृणालिनी ठेवायचं होतं  पण मामांनी चंदाराणी ठेवलं!जे मला मुळीच आवडायचं नाही.

खुप संपन्न घरात आणि निसर्गरम्य परिसरात माझा जन्म झाला, आजोबांनी तो बंगला त्यांच्या आमराईत बांधला होता, आजीआजोबा दोघेही सुशिक्षित, सुसंस्कृत, सामाजिक कार्यकर्ते, मामा पुण्यात एस. पी.काॅलेज मधे शिकत होते, मावशी नुकतीच मॅट्रीक पास झालेली, आजोळी आम्हा नातवंडांचे खुपच लाड झाले. मी आणि माझा मोठा भाऊ तीन चार वर्षाचे होईपर्यंत आजोळीच वाढलो. कारण माझ्या धाकट्या बहिणीच्या जन्माच्याआधी आई बरीच आजारी होती त्यामुळे आम्हा दोघांना माहेरी ठेऊन ती सासरी निघून गेली होती. आमचं हे आजोळ वाडा तालुक्यातलं तेव्हा ठाणे जिल्ह्यात असलेलं पण आता पालघर जिल्ह्यात गेलेलं छोटंसं गाव “वरले” नावाचं!गावात देशमुखांची सात आठ घरं बाकीचे कुणबी, कातकरी, कोळी, वारली लोक!

घरात कामाला कोळीण होती! ती घरात झाडलोट, धुणीभांडी, गड्यांसाठी नाचणीच्या आणि घरात नाष्ट्याला तांदुळाच्या भाकरी करत असे, चंदु आणि अप्पा नावाचे दोन गडी कायमचे जेऊन खाऊन होते.

माझी आजी सुगरण होती आणि वेगवेगळे पदार्थ करायची तिला आवड होती. माझं आजोळ आणि वडलांचं गाव दोन्ही कडे संपन्नता होती, भरपूर शेतीवाडी, दुधदुभतं, फळफळावळ, भाजीपाला, धनधान्य सगळं मुबलक होतं! आजोळ कोकणात तर वडिलांचं गाव घाटावर! मला ती दोन्ही गावं अजूनही खुप आवडतात. आमच्या शिक्षणासाठी १९६० साली आम्हा सख्ख्या चुलत पाच भावंडांना घेऊन आईनं पुण्यात बि-हाड केलं, आम्ही तीनचार वर्षे सदाशिव पेठेत तर तीन वर्षे डेक्कन जिमखान्यावर राहिलो! कधी दिवाळीच्या सुट्टीत तर कधी मे महिन्याच्या सुट्टीत आम्ही आजोळी जायचो, दोन्ही मामा मुंबईत तर कोल्हापूर सासर असलेली मावशी पण काही काळ पुण्यात रहात होती, सुट्टीत मावस, मामे भावंडं भेटत असू. मोठे मामा सिव्हिल इंजिनियर होते, त्यांच्याकडे कंपनीची “डाॅज”  होती,काळ्या रंगाची,त्या गाडीतून ते आम्हाला जवळपास च्या ठिकाणी विशेषतः वज्रेश्वरीला  फिरवून आणत! मे महिन्यात भरपूर हापूस आंबे असत! जांभळं, पेरू, चिक्कू, केळी बंगल्या भोवती ही असंख्य फळझाडं आणि फुलझाडं होती.जंगलात जाऊन करवंदं तोडायची, तळ्यावर फिरायला जायचं, भावंडांबरोबर पत्ते, बुद्धीबळ खेळायचे…अशी मस्त सुट्टी असायची!

त्या बंगल्यात वरच्या मजल्यावर स्वतंत्र अभ्यासिका होती कपाटात, मांडणीवर असंख्य मासिके, पुस्तके होती, आम्हा मुलांसाठी चांदोबा, अमृत ही  मासिके आणली जात. गावात असलेले चुलत मामा, मावशी ही खुप प्रेम करायचे. आजोळच्या सगळ्या आठवणी हापूस आंब्यासारख्या मधूर आहेत!

मध्यरात्री जन्मताना घेऊन आले चांदणे

गर्द काळ्या त्या तमाला भेदून आले चांदणे

जन्म जेथे जाहला त्या गावात माझा चांदवा

त्याच गावी आठवांचे ठेवून आले चांदणे

© प्रभा सोनवणे

“सोनवणे हाऊस”, ३४८ सोमवार पेठ, पंधरा ऑगस्ट चौक, विश्वेश्वर बँकेसमोर, पुणे 411011

मोबाईल-९२७०७२९५०३,  email- sonawane.prabha@gmail.com
≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ एका मोटरमनचं आयुष्य ☆ संग्राहक – सुश्री मीनल केळकर

? इंद्रधनुष्य ?

☆ एका मोटरमनचं आयुष्य ☆ संग्राहक – सुश्री मीनल केळकर☆

एक मोटरमन ( लोकल ट्रेनचा ड्रायव्हर) याने हे लिहिले आहे

शेवटची लोकल निघते सीएसटीवरून 12. 37 ला. आणि शेवटची पोहोचणारी लोकल असते 1. 38 ची. 12 वाजून 37 मिनीटांनी निघालेली लोकल तीन च्या दरम्यान पोहोचते कर्जत ला. तिथून ती रिटर्न निघते साधारण साडे चारला. मधल्या काळात मोटरमन आणि गार्ड आराम करतात ते त्यांच्यासाठी खास बनवलेल्या रेस्ट रुम मध्ये. तसं प्रत्येक मोटरमन आणि लोकल गार्ड यांच्यासाठी ड्युटी अवर्स असतात अधिक तम 6ते8तास. हे तास ट्रेनच्या रनिंग टाईमनुसार मोजले जातात. त्यात ट्रेन कुठे किती वेळ थांबली वगैरे ग्राह्य धरलं जात नाही. पण त्या  तासात पूर्ण वेळ डोळ्यात तेल घालून एकटक एका नजरेनं एका दिशेत पाहत राहणं, योग्य अंतरावर प्रॉपर नोटिफिकेशन देणं, दर चारशे मीटरवर येणाऱ्या सिग्नलला तपासणं शिवाय प्रत्येक स्पीड इंडिकेटरवर लक्ष ठेऊन स्पीड मेंटेन करणं अतिशय महत्त्वाचं असतं. रात्रीच्या वेळेस हे काम फार जिकीरीचं असतं. जर स्पीड 40 ऐवजी 42 वर जरी गेला तरी मोटरमन आणि गार्ड यांना कंट्रोल रुमकडून ताकीद जाते. ड्युटी संपल्यावर त्याचं लेखी कारण द्यावं लागतं. एखाद्या वेळेस मोटरमन कडून सिग्नल असताना जरी ट्रेन क्रॉस केली गेली तर अवघ्या पाचशे मीटर अंतर पुढे गेल्यावर ट्रेन आपोआप बंद होते. नवीन मोटरमन बोलावला जातो. चूक झालेल्या मोटरमनला आणि गार्डला आधी सस्पेंड केलं जातं मग चौकशी आयोगाला सामोरं जावं लागतं. चौकशी आयोगाच्या फेऱ्यात रेल्वे कर्मचारी अडकला की त्याचं त्यातून सुटणं मुश्किल असतं. तर ह्या अशा वाहनचालकांच्या बाबतीतलं थोडंसं.

मी अनेकदा यांच्या रेस्ट रुम मध्ये शिरून त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न केला. स्वभावाने बरे असतात. पण अबोल असतात. रोज रोज एकच रस्ता. तेच रुटीन, तेच सिग्नल, तेच काम त्यांच्या स्वभावाच्या एकसुरीपणाला कारणीभूत असेल असं वाटलं होतं. पण खरं कारण वेगळंच होतं. त्यातील काहींनी सांगितलेलं कारण फार भयानक होतं. प्रवाशी फुटओव्हर ब्रीजचा वापर करत नाहीत. अपघात होतात. वारंवार हाय डेसीबलचा हॉर्न वाजवून आमच्या कानांचे पडदे फाटतात पण बेजबाबदार प्रवाशांना स्वतःची काळजी करावीशी वाटत नाही. काही लोक आत्महत्या करण्यासाठी लोकलसमोर निर्धास्त होऊन उभे राहतात. काही मान रुळावर ठेऊन झोपून जातात. काही संडास करण्यासाठी रेल्वे ट्रॅकवर बसतात ते ही कानाला हेडफोन लावून. रेल्वे क्रॉसींग करताना कानात हेडफोन लावतात. त्यांचं चिरडलं जाणं, कापलं जाणं, तुकडे तुकडे पडलेले शरिर आम्हाला दर दोन तीन दिवसाआड एकदा तरी पहावंच लागतं. जेव्हा जेव्हा कुणी आत्महत्या करतं, ट्रेनमधून पडून मरतं, क्रॉसिंगच्या वेळेस मृत्यूमुखी पडतं तेव्हा आमचं हृदय काही काळासाठी स्टॉप झालेलं असतं. पण ट्रेन चालू असते. लगेच भानावर यावं लागतं. डोळे सुद्धा मिटता येत नाहीत. सिग्नल चुकवायचा नसतो. नाहीतर मोठ्या अनर्थाला सामोरं जावं लागू शकतं. पाहीलेला आघात कडु घोटासारखा गिळून घ्यावा लागतो. थोडा वेळ ही मिळत नाही सावरायला.

एकदा मोटरमनच्या कोचमधून प्रवास करत असताना एका मुलाने अगदी ऐन वेळेला ट्रॅक क्रॉस केला. थोडक्यात बचावला. ट्रेन साधारण ऐंशीच्या स्पीडला होती. मोटरमन भलताच वैतागला. खिडकीच्या बाहेर डोकं काढून त्या पोराला मजबूत शिव्या हासडल्या. म्हणाला, मादरचोद मेरी ही ट्रेन मिली थी क्या तुझे मरने के लिए? त्याचं हे बोलून होईपर्यंत गाडी बरीच पुढे निघून गेली होती. त्याचं बोलणं काय त्या मुलाला ऐकू जाणार नव्हतं. पण तरी मनातला राग व्यक्त करण्याचा त्याचा हा प्रकार होता. (शुभ अप झालेला BP नाॅमल करण्याचा प्रकार समजा हव तर)असो..

लास्ट लोकल च्या प्रवासात रुटीन अपघात होत असतात. कुणी दारातून पडतं तर कुणी ट्रेन पकडण्याच्या नादात तरी पडतं. तर कुणी लोकल सायडींगला लावल्यावर झोपायला मिळावं म्हणून अपोझिट साईडनं चालती ट्रेन पकडण्याच्या प्रयत्नात तरी चाकांमध्ये अडकतं. काही पोलिसांचा अटकाव नको म्हणून टपावर लपून बसतात. काही कपलिंगच्या स्पेस मध्ये लपतात. लपणारे, चढणारे तीनेक तासांसाठी आसरा शोधत असतात. काहींना गर्द घ्यायची असते,…

संग्राहक – सुश्री मीनल केळकर

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ कृष्णावळ…. ☆ प्रस्तुती – सुश्री मंजुषा सुनीत मुळे

सुश्री मंजुषा सुनीत मुळे

? वाचताना वेचलेले ?

☆ कृष्णावळ…. ☆ प्रस्तुती – सुश्री मंजुषा सुनीत मुळे ☆

आज आमच्या सासूबाई म्हणाल्या पोह्यांसाठी 2 कृष्णवळ द्या. मी ऐकतच राहिलो. मग त्या म्हणाल्या अहो म्हणजे कांदे !

कांद्याला कृष्णवळ म्हणतात हे मला पाहिल्यानंदीच समजले.

कृष्णावळ….. अर्थाच्या दृष्टीने अतिशय लक्षणीय असा हा शब्द !

आजकाल कोणीही नाही वापरत !

कृष्णावळ चा अर्थ कांदा !

कांद्याला असे म्हणण्याचे कारण गंमतशीर आहे.

कांदा उभा चिरला, तर तो शंखाकृती दिसतो… आणि आडवा चिरला, तर तो चक्राकृती दिसतो.

शंख आणि चक्र ही दोन्ही श्रीकृष्णाची आयुधे आहेत.

ही दोन्ही आयुधे एका कांद्यात पहायला मिळतात म्हणून गमतीने कांद्याला कृष्णावळ म्हणतात.

कृष्ण आणि वलय या दोन शब्दांचा संधी होऊन हा मराठी शब्द तयार झाला आहे.

पात्यांसकट उलटा धरला तर गदाकार  व  पाकळ्या उलगडून पद्माकारही होतो… आहे की नै गंमत…

डोळ्यातून पाणी काढणारा कांदा किती वेगळ्या उंचीवर गेला ना कृष्णावळ या शब्दामूळे !

प्रस्तुती – सुश्री मंजुषा सुनीत मुळे

९८२२८४६७६२.

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ उन्हातल्या चांदण्याचा बहर….भाग 1 – स्व. दत्ता हलसगीकर ☆ सौ. ज्योत्स्ना तानवडे

सौ.ज्योत्स्ना तानवडे

? मनमंजुषेतून ?

☆ उन्हातल्या चांदण्याचा बहर….भाग 1 – स्व दत्ता हलसगीकर ☆ सौ.ज्योत्स्ना तानवडे ☆ 

करुणाघन, कोषातून बाहेर, आशयघन,उन्हातल्या चांदण्यात, चाहूल वसंताची, शब्दरूप मी, सहवास, ऋतू सोहळे, झोका ( बालकविता )हे त्यांचे काव्यसंग्रह आहेत. कवितेतील अमृतघन (समीक्षा), तरुणासाठी दासबोध (ललित), परखड तुकाराम (ललित), बहिणाबाईंची गाणी (संपादित)ही त्यांची इतर पुस्तके आहेत.

सोलापूरची अर्वाचीन साहित्यिक ओळख म्हणून कवी संजीव, कवी रा.ना. पवार आणि कवी दत्ता हलसगीकर या त्रयीकडे पाहिले जाते. नवकवी आणि साहित्याच्या अभ्यासकांच्या पाठीवर दत्ताजींचा नेहमीच प्रोत्साहनाचा हात असे. दत्ताजींच्या नावे महाराष्ट्र साहित्य परिषद, जुळे सोलापूर ही संस्था ‘ कविवर्य दत्ता हलसगीकर राज्यस्तरीय श्रेष्ठ साहित्य पुरस्कार ‘ देत असते. अनेक नामवंत साहित्यिकांना हा पुरस्कार प्रदान केलेला आहे.

मलेशियातील जागतिक मराठी साहित्य संमेलनात फक्त दत्ताजींच्या कवितांचा विशेष कार्यक्रम झालेला होता. कार्यक्रमानंतर रसिकांनी टाळ्यांचा कडकडाट करीत त्यांना स्टँडिंग ओवेशन दिले होते.

आकाशवाणी हीरक महोत्सवानिमित्त १९ मार्च २०१३ रोजी दत्ताजींवर ‘ शुभंकराचा सांगाती ‘ नावाचा कार्यक्रम प्रसारित झाला होता. त्यात त्यांच्या कवितांचे वाचन, गायन सादर झाले होते.

 दत्ताजींच्या वागण्या, बोलण्यात एक अंगभूत साधेपणा होता. तो शेवटपर्यंत टिकून होता. वास्तविक जीवनातही ते अगदी मोकळ्या मनाने एक ‘जिंदादिल’ माणूस म्हणून वावरले. जीवनातील आनंद कसा घ्यावा यावर त्यांनी खूप सुंदर भाष्य केलेले आहे ते त्यांच्या ‘वय’ या कवितेत.

☆ वय ☆

वय झाले असेल माझे नाही असे नाही,

अजूनही फुलांची निमंत्रणे येत असतात मला |

डोळ्यावरच्या चष्म्याच्याही पलीकडचा

हिरवागार बहारदार खुणावतोय मळा ||

 

तुकारामाचा अभंग उत्कट ओढ लावतो तरी

अजूनही आर्त गझलेची चढते नशा | दिवसभर मग्न असतो माझ्या व्यापात मी

रुमझुमणारे पैंजण बांधून अजून येते निशा ||

 

सगळेच ऋतू वेढून आहेत, वसंत तर सखा

मस्त कोसळणार्‍या पावसात अजून राहतो उभा

दरवळणारा सुगंध घेऊन भेटते लाजरी उषा

वेड लावते अजून मला नक्षत्रांची आभा ||

 

वय म्हणजे नक्की काय, वार्धक्याची व्याख्या काय

न बोलवताही आपण, येतच असते मरण

पैलतीरावर नजर तरी जत्रेत रंगलो आहे

झुलते माझ्या दारात तारुण्याचे सदाबहार तोरण ||

 

असे हे मनाचे चिरतारुण्य त्यांनी शेवटपर्यंत जपले. कवितेच्या रचनात्मक स्वरूपावर हरखून न जाता आशयाशी प्रामाणिक राहायला हवं या विचारांवर ते ठाम होते. म्हणूनच ते सहजपणे लिहितात,

दारे उघडी ठेवली म्हणून फार बरे झाले

नाहीतर सडून गेलो असतो हवाबंद पोकळीत

उघड्या दारातून थोडीशी धूळ आली हे मान्य

वाऱ्यासवे सुगंधाच्या लाटाही आल्या झुळझुळत ||

रसिक मनाच्या दत्ताजींचा दृष्टिकोन खूप आशावादी होता. छोट्या छोट्या गोष्टीत जीवनातला आनंद शोधणारा होता. त्यात लढाऊ बाणा होता, तशीच फुलांची नाजूक गुंफण होती. ते म्हणतात,

जीवनात सारंच घडत नसतं आपल्या मनासारखं

नाही त्याचा नाद सोड, आहे त्याचा हात धर

जीवनावर प्रेम कर, जगणं फार सुंदर आहे

अमावस्येच्या रात्रीलाही नक्षत्रांच झुंबर आहे ||

ही त्यांची सदाबहार, सकारात्मक वृत्ती नीरस, कंटाळवाण्या नकारात्मकतेतून बाहेर काढणार आहे. असे हे विचारसंपन्न व्यक्तिमत्व ९ जून २०१२ ला आपल्यातून निघून गेले. जाता जाता ‘नेत्रदान’ करवून त्यांनी आपल्या शब्दांना कृतीची जोड दिली.त्यामुळे प्रतिभाशाली कवी बरोबरच सर्जनशील व्यक्ती म्हणून त्यांची प्रतिमा दृढ झाली.
अनंताच्या प्रवासाला जाण्याआधी ऋणनिर्देश करताना ‘तुमच्यामुळेच’ या कवितेत ते लिहितात,

तुमच्यामुळेच अंधारातून सुखरूप चालत आलो

आणि सुरेख घराच्या दाराआड येऊन पोहोचलो

अशी किर्रर्र रात्र होती उरात होती भीती

तुमच्या शब्दातला उजेड घेऊन,उजेड होऊन आलो ||

समाप्त

(संदर्भ — गुगल)

© सौ. ज्योत्स्ना तानवडे

सातारा 

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ यमक ☆ सुश्री सुषमा जोशी

? मनमंजुषेतून ?

☆ मनमंजुषेतून ☆ यमक ☆ सुश्री सुषमा जोशी ☆ 

ज्योतिताईंनी एकदा विचारलं, “एका ओळीने शेवट झाला की पुढच्या कडव्याची सुरुवात त्याच ओळीनं होते, या काव्यप्रकाराला काय म्हणतात?”  माझा हक्काचा स्रोत  म्हणजे आईदादा!

दादांचा फोन बंद होता आठ दिवसांपासून! जाम बेचैन झाले. म्हणून आमच्या व्हॉट्सअॅप ग्रुपवर पोस्ट करून ठेवलं. पाचव्या मिनिटाला दादांचा फोन!

“अगं, आत्ताच फोन सुरू झाला आणि तुझा मेसेज वाचला. ऐक, यमकाचे वेगवेगळे प्रकार आहेत. तू म्हणतेस ते दामयमकाच्या जवळपास जाणारं यमक असेल, असं आई म्हणत्ये.”

मागून मला आईच्या नाजूक गुणगुणण्याचा आवाज आला. आईची स्मरणशक्ती अफाट! कोणतीही कविता पाठ असते.

‘श्रीपति झाला दशरथ-सुत राम दशाननासि माराया|

मा राया जनकाची होय सुता त्रिजगदाधि साराया|

सारा या प्रभुची हे लीला गाती सदैवही सुकवी|

सुकवी भवजलिं निधितें निरुपमसुख रसिक जन मनीं पिकवी|’

(पहिल्या ओळीचा शेवट ती पुढच्या ओळीची सुरुवात. पण अर्थ वेगळा.)

दादा म्हणाले, “हे बघ ऐक!” त्यांनी तोवर, ते आठवीत असतानाचं (आईला ८४ वर्षे पूर्ण होतील आता. दादा ८६ वर्षांचे!) मराठीचं पुस्तक आणलं होतं.  पाय प्रचंड दुखतात त्यांचे! पण ब्रिज आणि भाषा हे विषय आले की, त्यांना पंख लाभतात!

तर कुमार भा. वि. जोशी, इयत्ता आठवी, असं लिहिलेलं पुस्तक हातात घेऊन त्यांनी मला यमकाचे प्रकार सांगितले. थोडक्यात इथे मांडत आहे.

१) एकाक्षरी यमक: 

एक्या पदे भूमि भरोनि थोडी

दुजा पदे अंडकटाह फोडी

(डी ला डी हे एकाक्षरी यमक)

२) द्व्यक्षरी

दे तीसरा पाद म्हणे बळीला

म्हणोनी पाशी दृढ आकळीला

(ळीला हे द्व्यक्षरी)

३)चतुराक्षरी

बाई म्यां उगवताच रवीला

दाट घालुनि दही चरवीला

त्यात गे फिरवितांच रवीला

सार काढुन हरी चरवीला

(काय अफाट आहे ना हे!  प्रत्येक ‘चरवीला’ वेगळा आशय मांडतो.)

४) मग एकाचा अन्त्य आणि दुसऱ्याचा आदि चरण सारखा.

सेवुनि संतत पाला, संत तपाला यदर्थ करतात

तो प्रिय या स्तवना की, यास्तव नाकीहि तेंचि वरितात

५) दामयमकाचं उदाहरण वर दिलंच आहे.

६) पुष्पयमक: प्रत्येक चरणात यतीच्या ठिकाणी येणारं यमक.

सुसंगति सदा घडो… पडो.. झडो… नावडो

७) अश्वघाटी: घोड्यासारखी गती असलेलं यमक.

वाजत गाजत साजत आज तया जतन करुनि आणा हो

(वाजत गाजत साजत आजत याजत.. अशी गंमत आहे.)

मज मागे मत्स्यांचा हा रिपु – शशि- राहु- बाहु राणा हो

८) युग्मक यमक हा भन्नाट प्रकार आहे.

पायां नमी देइन वंश सारा

पा या न मी दे इनवंशसारा

(इन म्हणजे सूर्य, इनवंशसार म्हणजे सूर्यवंशात जन्मलेल्यांचं सार म्हणजे राम!)

९) समुद्रक यमक

हेही अफाट प्रकरण आहे. –

अनलसमीहित साधी राया, वारा महीवरा कामा

अनलस मीहि तसा धीरा यावा रामही वराका मा

(हे पृथ्वीपते धर्मा, वारा जसे अग्नीचे कार्य साधतो, तसे तुला  साह्य करण्यास मी सदैव तयार आहे. हे धीरा, बलरामही हवे तर येतील. मग वराका (बिचारी) मा (रुक्मिणी) तुझ्या साह्यास का येणार नाही?

अशा यमकांत चमत्कृती असते. पण काव्याचा ओघ नसतो. हे काव्य कृत्रिम असलं, तरीही हे प्रतिभेचंच देणं, लेणं आहे हे निःसंशय!

©️ सुश्री सुषमा जोशी 

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ हे भारतातच घडू शकतं… भाग-2☆ सुश्री मृदुला बेळे

?इंद्रधनुष्य? 

☆ हे भारतातच घडू शकतं… भाग-2 ☆ सुश्री मृदुला बेळे☆

एकदाची  शेवटच्या मजल्यावरच्या त्यांच्या भव्य कार्यालयात जाऊन पोचले. त्यांच्या कार्यालयात होते ते स्वत: आणि एमके हमीद- त्यांचे बंधू. लालसर गोरापान रंग, पूर्ण चंदेरी झालेले केस, तीक्ष्ण नजर पण बोलण्यात अत्यंत मार्दव असलेले माझ्या आजोबांच्या वयाचे डॉ. युसुफ हमीद. त्यांच्या व्यक्तीमत्वाला एक वलय होतं…आणि त्यांच्यासमोर बसल्या बसल्या ते मला जाणवू लागलं. त्यानी मजेशीर बोलून माझी चिंता एकदम दूर पळवून लावली आणि मग आमच्या गप्पा सुरू झाल्या. मला हे का लिहावसं वाटतंय असं त्यानी आधी समजून घेतलं. मग मी किती पाण्यात आहे हे जोखण्यासाठी त्यानी मला माझं या विषयातलं ज्ञान तपासून पाहणारे काही प्रश्न विचारले. आणि मी बरोबर उत्तरं दिल्यावर मग मला म्हणाले, ” हं…आता विचार”. आणि मी त्यांची मुलाखत घेऊ लागले.

उत्तरं देताना प्रत्येक गोष्ट त्यांना अगदी लख्ख आठवत होती. किती तरी औषधांच्या रासायनिक संरचना ते समोरच्या वहीत झरझर  काढत होते. मधनंच ” रोझी sssरोझीssss” अश्या मोठमोठ्याने हाका मारत आपल्या सेक्रेटरीला कुठला तरी शोधनिबंध,  वृत्तपत्रातला एखादा लेख, एखादं पुस्तक आणायला लावत होते. जेवायची वेळ झाली. त्या दिवशी प्रत्यक्ष डॉ.  युसुफ हमीद याच्या पंगतीला बसून जेवण्याचा मान माझ्या नशिबात होता. जेवणं आटपून कॉफी पीत पीत आमची मुलाखत परत सुरू झाली. त्या दिवशी संपली नाही म्हणून दुसऱ्या दिवशीही  चालू राह्यली. बोलण्याच्या ओघात मी ज्या लोकांशी बोलायला हवं अश्या किती तरी लोकांची नावं ते मला सांगत होते आणि मी लिहून घेत होते. मुलाखत संपवून  मी नाशिकला परत आले तेंव्हा मी खरोखर थक्क झाले होते. डॉ.  हमीद यांच्या ज्ञानी, मृदू हुशार व्यक्तीमत्वाने दीपून गेले होते.

दोनच दिवसात त्यांच्याकडून एक खोकं भरून पुस्तकं, सीडीज, वृत्तपत्रीय लेख माझ्या घरी येऊन पोचले. त्यानंतर त्यानी सांगितलेल्या या लढ्यातल्या शिलेदारांना शोधून काढून त्यांच्याशी संपर्क करण्याचा माझा उद्योग सुरू झाला. ही मंडळी जगभर पसरलेली होती.

मी राजहंसच्या दि. ग. माजगावकरांना पुस्तकाची कल्पना कानावर घातली आणि त्यांनीही पुस्तक करायला आनंदाने होकार दिला. देशोदेशी पसरलेल्या माझ्या कहाणीच्या नायकांचा शोध घेण्यात गुंतून गेले.

विशेष उल्लेख करीन तो न्यू यॉर्क टाइम्स वृत्तपत्रात आरोग्य विषयक लिखाण करणारे पत्रकार डोनाल्ड मॅकनील यांचा. डोनाल्डने मला आतोनात मदत  केली.  डॉ. हमीद यांचं काम सगळ्यात आधी जगाच्या नकाशावर जाहीरपणे आणलं ते डोनाल्डने- न्यू यॉर्क टाईम्समधे याबाबत लेख लिहून. मी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं द्यायला डोनाल्डने मला  मोठमोठे ईमेल्स लिहिले, दुसऱ्याना  फोनवर दिलेल्या मुलाखती मला पाठवल्या, स्वत: लिहिलेलं काही लिखाण पाठवलं…आणि इतर किमान पन्नास लोकांशी माझ्या ओळखी करून दिल्या. या सगळ्यांची मी आजन्म  ऋणी राहीन.

तुरीनला असताना जी कहाणी ऐकून मी प्रचंड अस्वस्थ झाले होते, हलले होते, ती कहाणी या सगळ्या मंडळींबरोबर जणू पुन्हा एकदा जगले. त्या कहाणीचा एक भाग झाले. या सगळ्यांशी बोलताना, या बद्दल लिहिताना अनेकदा फार  भावनिक व्हायला झालं. ही कहाणी लिहिताना औषधनिर्माणशास्त्राची एक प्राध्यापक आणि आजन्म विद्यार्थिनी म्हणून माझी सामाजिक बांधिलकी काय आहे याची लख्ख जाणीव मला झाली. ती जाणीव माझ्या विद्यार्थ्यांमधे यावी म्हणून मी फार विचारपूर्वक प्रयत्न करू लागले.

या विषयातली सगळी तांत्रिक माहिती लिहायची,  पण ती सामान्य माणसाला समजली पाहिजे, त्यासाठी ती कादंबरीसारख्या फॉर्ममधे कशी लिहिता येईल, हे एक मोठंच आव्हान होतं.

सामान्य माणूस महाग औषधं घेत राहतो आणि पिळवटला जातो. हे थांबवण्यासाठी भारतीय पेटंट कायद्यात फार उत्तम सुविधा आहेत. त्यावर जगभरातून, विशेषतः अमेरिका आणि युरोपातून प्रचंड टिका होते, भारतावर प्रचंड दबाव आणला जातो. पण आपलं सरकार बधत नाही. आमच्या जनतेचं आरोग्य तुमच्या पेटंटसपेक्षा जास्त महत्वाचं आहे हे ठणकावून सांगत राहते. रेडक्रॉस,  डॉक्टर्स विदाउट बॉर्डर्स सारख्या सेवाभावी संस्थांना गरीब देशात काम करण्यासाठी morning स्वस्त पण उत्तम दर्जाची औषधं भारत पुरवत राहतो. पण त्याचबरोबर अमेरिका आणि युरोपसारख्या दर्जाबाबत अत्यंत जागरूक असणाऱ्या देशांचाही सगळ्यात मोठा निर्यातदार बनतो. भारत  हे कसं करू धजावतो हे जाणून घेण्यात इतर देशातल्या लोकांना प्रचंड रस असतो. आर्जेन्टिना, इंडोनेशियातले लोक जेंव्हा येऊन सांगतात की “सामान्य नागरिकांना औषधं स्वस्तात मिळावी म्हणून काय करायचं हे भारताने आम्हाला शिकवलंय आणि तुम्ही दाखवलेल्या रस्त्यावर आम्ही चालतोय”,  तेंव्हा ऊर अभिमानाने भरून येतो.

सगळ्या जगाची फार्मसी  म्हणून ओळखल्या जाणाऱ्या भारताच्या औषधनिर्माण उद्योगाचा आपण एक लहान बिंदू इतका छोटा भाग आहोत या विचाराने फार कृतार्थ  वाटतं! आणि म्हणूनच हे ऋण फेडण्यासाठी माझ्यासारख्या या बिंदूने केलेला एक छोटासा प्रयत्न, उचललेला एक खारीचा वाटा,  म्हणजे हे पुस्तक आहे. भारताबद्दल अभिमान वाटण्याचे आणखी एक कारण हे पुस्तक वाचकांना नक्की देईल याची मला नुसती आशा नव्हे तर खात्री वाटते!

समाप्त 

© सुश्री मृदुला बेळे

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – सूर संगत ☆ सूर संगत~ राग~ खमाज ☆ सुश्री अरूणा मुल्हेरकर

सुश्री अरूणा मुल्हेरकर

? सूरसंगत ?

☆ सूर संगत~ राग~ खमाज ☆ सुश्री अरूणा मुल्हेरकर ☆ 

मागील दोन तीन आठवडे लोकसंगीत~लावणी/पोवाडा/जीवन व संगीत अशा विषयांचा उहापोह केल्यानंतर आज विवेचनासाठी पुन्हा एक नवीन राग खमाज घेऊया.

पंडीत व्यंकटमुखींच्या ७२ थाटांतून पं.भातखंडेजींनी जी १० थाटांची रचना केली त्यांतील खमाज थाटांतून खमाज नावानेच हा राग निर्माण झाला म्हणून हा जनकराग.

या रागाचे “कल्पद्रुमांकूर” या पुस्तकात असे वर्णन आढळते.

“खमाजो यत्र तीव्रा ऋषभगधनयो मो मृदुर्नमृर्दुःस्याद् ।

आरोहे र्रिनिषिद्धेः प्रभवति परिपूर्णोsवरोहे पवक्रः।।

वादी गांधार एव प्रविलसति संप्रवादो निषादो।

रात्र्याम् यामे द्वितीये प्रमुदयति मनः श्रोतुरपियेष रागः।।

अर्थात ~या खमाज रागात रिषभ(रे),गंधार(ग) व  धैवत(ध)हे तीव्र म्हणजे शुद्ध आहेत. आरोहात रे वर्ज्य तसेच अवरोह संपूर्ण सात स्वरांचा.जसे

सा ग म प (नी) सां

सां (नी)ध प म ग रे सा

पंचमाचा उपयोग वक्र पद्धतीने होतो.{(नी) ध म प म प म ग म}

वादी स्वर गंधार  आणि संवादी निषाद या रागाला खुलवितात.

रात्रीच्या दुसर्‍या प्रहरी गायिल्याने/वाजविल्याने रसिकांच्या मनाला आनंदीत करतो.

ह्यांत भक्तीची भावना आहे म्हणून खमाज थाटाला ‘हरीका मेल” असे म्हटले असावे. कारण या रागात भक्तियुक्त पारंपारिक बंदीशी आढळतात.मग ती भक्ति ईश्वराप्रति असेल किंवा गुरूजनांप्रति आदर व्यक्त करणारी असेल.उदाहरणार्थ~

“नमन करू मै सद्गुरू चरणा।

सब दुखहरणा भवनिस्तरणा।।

शुद्धभाव धर अंतःकरणा ।

सूर नर किन्नर वंदित चरणा।।”

भक्तीबरोबरच खमाजच्या सुरावटीतून मुख्यत्वेकरून श्रृंगार रसाचा आविष्कार होतो.श्रृंगारिक भाव असलेली ठुमरी या रागाच्या सुरावटीत ऐकताना फार बहार येते.

शोभा गुर्टूंची ‘राधा नंदकुवर समझाये’ ही ठुमरी ऐकतांना अगतिक राधा डोळ्यासमोर उभी राहते.’बारी उमर लरकैया’,’कुसुमऋत आयी’ ह्या शोभाताईंच्या आणखी काही खमाज ठुमर्‍या आहेत.’जरा धीरेसे बोलो कोई सुन लेगा’ हा बेगम अख्तरबाईंचा खमाज दादरा प्रसिद्ध आहे.सुरेशबाबू माने’देखो जिया बेचैन’ आणि ‘नजरिया लागे प्यार’ या ठुमर्‍या रसील्या ढंगाने गात असत.केसरबाईंची ‘आये श्याम मोसे खेलत नाही, सिद्धेश्वरीदेवींची ‘तुमसे लागी प्रीत सांवरिया’ या खमाज ठुमर्‍यांचे रेकाॅर्डिंग ऐकतांना मन वेडावून जाते.शुभा मुद्गलांची ‘बाबूल जिया मोरा घबराये’ ही ठुमरीश्रोत्यांना मंत्रमुग्ध करते,

‘धीर धरी धीर धरी । जागृत गिरीधारी’,’नाही  मी बोलत नाथा,मधु मधुरा तव गिरा, ‘या नव नवल नयनोत्सवा’ ही नाट्यपदे,आज २००वर्षांनंतरही आपण ऐकतो.’या जन्मावर या जगण्यावर शतदां प्रेम करावे’ हे कै.अरूण दाते यांनी रसिकांच्या मनांत घर केलेले भावगीत, ही आणखी काही खमाजची उदाहरणे देतां येतील.

खमाज ऐकतांना आपल्या असे लक्षांत येते की ह्या रागाची वृत्ती आनंदी, खेळकर आहे. मनाला आनंद देणारे खमाजचे स्वर कधीतरी उदासही करतात मात्र.

संशयकल्लोळ नाटकाची नायिका रेवती जेव्हा एकटीच’संशय का मनी आला’ हे पद गात असते तेव्हा या उदासीनतेचा प्रत्यय येतो खरे तर हा जनक राग,परन्तु याचा पसारा फार मोठा नाही.त्यामुळे या रागांत ख्याल गायन ऐकावयास मिळत नाही.

मात्र उपशास्त्रीय संगीताच्या प्रांगणात हा राजाप्रमाणे दिमाखाने मिरविणारा राग आहे असे म्हणणे योग्यच ठरेल.

©  सुश्री अरूणा मुल्हेरकर

डेट्राॅईट (मिशिगन) यू.एस्.ए.

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ स्निग्ध जिव्हाळा तुझा लाभला (एक आस्वादन) – भाग 4 ☆ श्रीमती उज्ज्वला केळकर

कवयित्री शांताबाई शेळके विशेषांक

श्रीमती उज्ज्वला केळकर

?  विविधा ?

☆ स्निग्ध जिव्हाळा तुझा लाभला (एक आस्वादन) – भाग 4 ☆ श्रीमती उज्ज्वला केळकर ☆

(मागील भागात – शांताबाईंचे चिंतन, त्यांचा आत्मशोध ‘जीवलगा’सारख्या गीतातून कसा उत्कटतेने प्रगट झालाय……  आता इथून पुढे …..)

परतुनि या हो माझ्या जिवा

शांताबाईंची गीते ही त्यांच्याच कवितांचे लोभसवाणे रूप आहे. शब्दातून प्रकट होणार्‍या अनुभूतीला इथे सुरांची साथ मिळते. अनेकदा आधी तयार केलेल्या सुरावटीवर त्यांनी शब्द बांधले आहेत. पण तालासुराच्या चौकटीत त्यांनी शब्द कोंबले आहेत, ते फरफटले आहेत, विकृत झाले आहेत, असं कुठेच झालं नाही. स्वर आणि शब्द तिथे एकरूप होऊन येतात. स्वरनिरपेक्ष ती रचना जरी वाचली, तरी चांगली कविता वाचल्याचा आनंद ती देते. ‘तोच चंद्रमा’ नभात या गीतात, ‘त्या पहिल्या प्रीतीच्या आज लोपल्या खुणा

वाळल्या फुलात व्यर्थ गंध शोधतो पुन्हा’ यातून व्यक्त झालेले वास्तव… नित्याचे झाले की ती उत्कटता लोपते, हा नेहमीचा अनुभव किती उंचीवर नेलाय कवयित्रीने. ‘हे श्यामसुंदर’ मध्ये राजासा, मनमोहना, करत त्याची केलेली विनवणी, पावरीचा सूर ऐकताच स्वत:चे हरवलेपण.. खरं तर ते आतून हवेच आहे, पण

‘पानजाळी सळसळे का? भिवविती रे लाख शंका थरथरे बावरे मन, संगती सखी नच कुणी‘

यातून व्यक्त झालेले भय… ही द्विधावस्था या गीतात कशी नेमकेपणाने प्रकट झालीय.

‘गहन जाहल्या सांजसावल्या पाऊस ओली हवा माझ्यासांगे सौधावरती एकच जळतो दिवा. आज अचानक आठवणींचा दाटून आला थवा परतुनि या हो माझ्या जिवा’ या हळुवार लोभासतेने शांताबाईंच्या लावण्या लावण्यामयी झाल्या आहेत.

उत्कृष्ट लावण्प्रमाणेच शांताबाईंनी वेधक द्वंद्वगीते आणि अनुपम भावगीतेही लिहिली आहेत. आपल्याला आवडलेल्या हिंदी, गुजराती, बंगाली गीतांच्या चालीवर आराठीत गीतरचना करण्याचे प्रयोगही त्यांनी केले आहेत. वृत्तबद्ध आणि छंदोबद्धकाव्याचे संस्कार त्यांच्यावर बालपणापासून झालेले आहेत. त्यातूनच त्यांची गीतरचना सहज आणि सफाईदार झाली आहे.  ‘कळ्यांचे दिवस फुलांच्या राती’ या आपल्या गीतसंकलनाच्या प्रस्तावनेत त्या म्हणतात, ‘कविता आणि गीत‘ या दोहोंमागच्या प्रेरणा भिन्न असतात. तशीच त्यांची कलात्मक मागणीही भिन्न प्रकारची असते. गूढता, सूचकता, अल्पाक्षरत्व आणि संपूर्ण व्यक्तिगत अनुभवामुळे येणारी पृथगात्मता हे कवितेसाठी आवश्यक असते. उलट, सोपेपणा, सहजता, नाट्यमयता, चित्रदर्शित्व, ऐकताक्षणी मनात उलगडत जाईल अशी शब्दकळा ही गीताची गरज असते.’ शांताबाई यशस्वी गीतकार आहेतच, पण त्यापुढे जाऊन, त्यांनी आपल्या गीतांना स्वत:चे असे खास परिमाण दिले आहे. त्या म्हणतात, ‘चांगले गीत ही चांगली कविताही असते.’ शांताबाईंच्या गीतांबद्दल हे खात्रीपूर्वक म्हणता येईल. त्यांच्या मते गीत हे कवितेप्रमाणे स्वतंत्र आणि आपले अंगभूत चैतन्य घेऊन प्रगटते. त्यांच्या ‘ऋतु हिरवा ऋतु बारवा’ कळ्यांचे दिवस फुलांच्या राती’, ‘रुपेरी वाळूत माडांच्या बनात ये ना’, ‘सजणा का धरीला परदेश’, अशी किते तरी गीतं आपल्या कानात रुंजी घालू लागतात.

क्रमश: ….

©️ श्रीमती उज्ज्वला केळकर

176/2 ‘गायत्री’, प्लॉट नं 12, वसंत साखर कामगार भवन जवळ, सांगली 416416 मो.-  9403310170

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ उन्हातल्या चांदण्याचा बहर….भाग 1 स्व. दत्ता हलसगीकर ☆ सौ. ज्योत्स्ना तानवडे

सौ.ज्योत्स्ना तानवडे

 ? मनमंजुषेतून ?

☆ उन्हातल्या चांदण्याचा बहर….भाग 1 स्व दत्ता हलसगीकर ☆ सौ.ज्योत्स्ना तानवडे ☆ 

 “उन्हातल्या चांदण्याचा बहर” श्री. दत्ता हलसगीकर – भाग १

सामाजिक क्षेत्रात वावरत असताना एक कविता बऱ्याचदा भेटत गेली आणि त्या कवितेने मनात घरच केले. ती कविता होती

ज्यांची बाग फुलून आली

त्यांनी दोन फुले द्यावीत

ज्यांचे सूर जुळून आले

त्यांनी दोन गाणी द्यावीत ||

अशाप्रकारे सामाजिक परिस्थितीची जाणीव करून देणारी ही आशयघन कविता ज्यांची आहे ते आहेत सुप्रसिद्ध कवी श्री गणेश तात्याजी हलसगीकर उर्फ दत्ता हलसगीकर. सात ऑगस्ट १९३४ रोजी जन्मलेले दत्ताजी शेवटपर्यंत सोलापूरला राहत होते. त्यांनी सोलापूरातच लक्ष्मी विष्णू मिलमध्ये वयाच्या साठाव्या वर्षापर्यंत नोकरी केली. त्यांना लिखाणाची आवड होती. किशोर वयापासून अखेरपर्यंत त्यांनी काव्यलेखन आणि ललित लेखन केले.

दत्ताजींच्या वागण्या बोलण्यात साधेपणा, सोशिकता, अगत्य होते तेच त्यांच्या कवितेतून व्यक्त होई. प्रेमळ, निर्मळ, सात्विक असे त्यांचे व्यक्तिमत्व होते.

त्यांच्या काव्यरचना सोप्या, हळुवार,प्रवाही होत्या. त्यांनी आपल्या कवितेतून वंचितांचे दुःख मांडले. गोरगरिबांबद्दल कणव बाळगणारी यांची कविता मनाला भिडणारी, सामूहिक आवाहन करणारी आहे.

त्यांची कविता श्रमिकांपासून  श्रीमंतांपर्यंत भाष्य करताना जास्त खुलून येते. तर श्रमिकांबद्दल जास्तीच हळवी होते. जगण्याचा आनंद कशात आहे, जगणे कसे सुखकर करता येईल हे त्यांनी कवितेतून सांगितले. ‘ उंची ‘या कवितेतून त्यांनी ‘ ज्यांची बाग फुलून आली ‘ अशा देखण्या शब्दात सामाजिक परिस्थितीची जाणीव समाजाला करून दिली.

या कवितेने इतिहास घडवला आहे.२२भाषांमधे तिचे भाषांतर झालेले आहे. आकाशवाणीवरून ही कविता असंख्य वेळा वाचली गेलेली आहे. २०११ साली आकाशवाणीवर झालेल्या राष्ट्रीय कविसंमेलनात दत्ताजींचा सक्रिय सहभाग होता. वाराणसीत झालेल्या सर्वभाषी कविसंमेलनात दत्ताजींनी हीच कविता वाचली होती.

☆ उंची ☆

ज्यांची बाग फुलून आली

त्यांनी दोन फुले द्यावीत

ज्यांचे सूर जुळुन आले

त्यांनी दोन गाणी द्यावीत ||

 

ज्यांच्या अंगणी ढग झूकले

त्यांनी दोन ओंजळ पाणी द्यावे

आपले श्रीमंत हृदय त्यांनी

रीते करून भरून घ्यावे ||

 

सूर्यकुलाशी ज्यांचे नाते

त्यांनी थोडा उजेड द्यावा

युगायुगाचा अंधार जेथे

पहाटेचा गाव न्यावा ||

 

आभाळाएवढी ज्यांची उंची

त्यांनी थोडेसे खाली यावे

मातीत ज्यांचे जन्म मळले

त्यांना उचलून वरती घ्यावे ||

अतिशय तरल शब्दात त्यांनी सामाजिक जाणीवेचा वसा सांगितला आहे. त्यांची कविता समाज वेदनांनी व्यथित होतानाच वात्सल्याने भरून येते. अंधाराचे गाऱ्हाणे मांडताना प्रकाशाचे तोरण लावते.मातीशी इमान राखत आभाळाशी नाते सांगते. त्यामुळे त्यांचे शब्द कधी शीतल, सोज्वळ वाटतात तर कधी फटकारे मारणारे वाटतात.म्हणूनच

एकट्याने किती करावी जाग्रणे

झाडांशी अंगणे दुसऱ्यांची ||

असे परखड बोल ते सुनावतात.याच बरोबरीने

एवढासा अंधार मोठा होत गेला

त्याने सूर्य सुद्धा झाकून टाकला |

विनाशाची एवढीशी निसरडी वाट

एवढ्याशा छिद्राने रिता झाला माठ ||

असे चिरंतन जीवनज्ञानही ते सहजपणे सांगून जातात. एकूणच दत्ताजींची विचारसरणी सकारात्मक, वास्तवदर्शी आहे. कोणत्याही परिस्थितीत निराश न होता जिद्दीने पुढे जायचे हे सांगताना ते म्हणतात,

 मला अजून पहाटेची स्वप्ने पडत आहेत

थोड्याशा अंधाराने मी निराश नाही

अजून मला वसंताची चाहून लागत आहे

थोड्याशा पानझडीने मी हताश नाही ||

अशी त्यांची कविता एकाच वेळी आनंद आणि दुःखाचे प्रेरणादायी अनुभव देते आणि आपल्या मनातही सकारात्मकता जागवते.

क्रमशः ....

© सौ. ज्योत्स्ना तानवडे

सातारा 

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares