मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ तुम भी चलो… हम भी चले… ☆ सुश्री संध्या बेडेकर ☆

सुश्री संध्या बेडेकर

? मनमंजुषेतून ?

☆ ‘तुम भी चलो… हम भी चले…’ ☆ सुश्री संध्या बेडेकर ☆

तुम भी चलो, हम भी चले ••• 

आज वर्ष झालं. तो एक धाडसी निर्णयच होता. थोडा वेगळा समजायला, पचायलाही. खर तर तारेवरची कसरतच होती सर्वांची. ते एक जगावेगळ आव्हानच होत. अगदी शिवधनुष्य पेलण्याएवढे कठीण.

खरच या निर्णयात निर्णय घेणारे आणि त्या निर्णयाला संमती देणारे, कोणा कोणाचे कौतुक करावे कळतच नाही. सर्वांचेच कौतुक.

यात एकच गोष्ट कॉमन होती ती म्हणजे सर्वांनी एकमेकांचा विचार केला, मुख्य म्हणजे मुलांचा विचार केला. शेवटी आई वडीलच ते. जेथे मुलांचा प्रश्न येतो तेथे सहज तडजोड करण जमत त्यांना. अनेक न पटणारे विचार सहज पटतात. आपला कम्फर्ट झोन सोडून या वयातही * adjust * करायला तयार होणे, म्हणजे कौतुकच आहे. नाही का?

आज देशमुखांकडे *celebration* आहे. अजय अनिता अनय खास अमेरिकेहून आले आहेत.

अनय खूप खुश आहे. दोन आजी, आजोबा सर्व एकत्र भेटले, म्हणून आनंदात आहे. दिवसभर दोन्ही आजींबरोबर *पाच तीन दोन* पत्त्यांचा खेळ सुरू आहे.

अजय अनिता बाबांबरोबर बसून घरात काही चेंन्जेस करण्यात बिझी आहेत.

उद्या सर्वांना अष्ट विनायक दर्शनाला जायचे आहे. त्याआधी काही काम उरकरायची आहेत.

हीच ती तारीख १ जानेवारी २०२३ 

माझ्या चांगली लक्षात आहे.

ताईचा फोन आला होता, आणि तिने अजय अनिताच्या प्रस्तावाबाबत सांगितले होते.

ताईने जे सांगितले होते, ते असे••• ती म्हणाली••••

आज सकाळी सकाळी अजयचा फोन आला.

फोन घेता घेता आत्ता अमेरिकेत किती वाजले असतील? हा हिशेब नेहमी प्रमाणेच मनातल्या मनात झाला.

अजय म्हणाला, ••••

आई!! बाबा आहेत ना. मग फोन स्पीकर वर टाक. तसेही आम्ही नेहमीच फोन स्पीकर वर टाकतोच. कारण मुलाचा, सूनेचा आणि त्याहून महत्वाचा म्हणजे नातवाचा आवाज ऐकायचा असतो. अर्धवट मराठी, इंग्रजी एक्सेंट मधील मराठी ऐकायचे असते. हा एनर्जी डोज मिळाला की आमचा दिवस मजेत जातो.

बरे असो,

मी म्हटलं, ••• काय रे काही विशेष? सर्व ठीक आहे ना.

अनिता म्हणाली, ••• 

आई बाबा!! सर्व ठीक आहे. एका महत्वाच्या विषयावर तुमच्या बरोबर बोलायचे आहे. मागच्या दोन महिन्यांपासून आम्ही विचार करतोय. आज विषय काढायचाच, अस ठरवलंय.

आता ही मुलं काय बोलणार आहेत?

आम्ही दोघांनी एकमेकांकडे बघीतल.

बाबा म्हणाले, ••••

अग!! बोल बेटा. बिनधास्त सांगा / विचारा.

काय बोलायचे आहे?

अनिता म्हणाली, ••••

बाबा! माझ्या आईचा प्रश्न आहे हो. आता वर्ष झालं माझ्या बाबांना जाऊन, पण आई अजूनही सावरलेली नाही. अबोल स्वभावामुळे मैत्रीणी नाही. एकटेपणा जाणवतोय तिला. सारख काही तरी सुरूच असत. बरं! येथे यायला तयार नाही. आम्ही सारखं तेथे येऊ शकत नाही.

आम्हाला तुमच्या दोघांची, आईची काळजी असते. आमच्या समोर आमचा वर्तमान, भविष्य आणि तुम्ही सर्व, अशा तीन प्रकारच्या गोष्टी नेहमीच महत्वाच्या असतात. आमची जबाबदारीच आहे ती.

आज आम्ही पैसा भरपूर कमवतोय, पण तुम्हाला वेळ देऊ शकत नाही. याचा खेद आहे.

अजय ही खूपदा अस्वस्थ होतो. पण आता या middle of the phase मध्ये काय धरावं?? आणि काय सोडावं?? कळत नाहिये.

खूप दिवसांपासून आमच्या मनात एक विचार येतोय, की तेथे म्हणजे भारतात एक मोठे घर घ्यावे. तेथे तुम्ही दोघे आणि माझी आई, तुम्ही सर्व एकत्र राहाल, तर आमची काळजी कमी होईल.

आम्ही तशी एक सोसायटी शोधली आहे, जेथे ज्येष्ठांच्या वयाप्रमाणे, गरजेप्रमाणे सर्व सोई उपलब्ध आहेत. Residential doctor आहे. इतर चांगल्या दवाखान्यां बरोबर त्यांचं टाय अप ही आहे. सर्व सोयी सुविधा उपलब्ध आहेत. ज्येष्ठांच्या अनेक activities पण तेथे आहेत.

तुम्ही दोघे *आनंदवन * ही सोसायटी बघून याल का??

आज आम्ही तुमच्या बरोबर हा विषय बोलतोय, उद्या परवा आई बरोबर बोलू. तुमच्या सर्वांचे मत महत्वाचे आहे. तुम्हाला आणि आईला पटलं तर तसं करता येईल. तुम्ही दोघांनी विचार करावा.

ताई भाऊजी विचारात मग्न झाले. ते मधून मधून अनिताच्या आईला भेटायला जातात. त्या एकट्याच असतात, म्हणून त्यांची काळजी सर्वांनाच असते. एकदा ताई अनिताला म्हणाली ही होती, •••

अग!! आम्ही सारखं जाऊ शकत नाही. तेंव्हा एखादा फ्लॅट येथेच आमच्या सोसायटीत तुझ्या आईसाठी घेतला तर बरे होईल.

आता एकदम एकत्र रहायचा प्रस्ताव??

आता किती तरी वर्षांपासून आम्ही दोघेच आहोत. खरं सांगू का?

कोणाकडे दोन दिवस राहणे किंवा कोणी दोन दिवस घरी रहायला आले, तरी सर्व रूटीन गडबड होत. केंव्हा एकदा आपल्या घरी जातो असं वाटतं.

आणि येथे तर नातं आहे. तेही नाजूक. दूर राहून विचार पूस करणं वेगळं पण एकत्र राहण. जमेल का? चोवीस तास एकत्र राहण सोपं नक्कीच नाही. कोणाबरोबर ही नाही. या वयात प्रत्येकाची जगण्याची एक पद्धत सेट झालेली असते. ती बदलणे जमेल का?

हा प्रश्न मंगलाताईंनाही पडेलच. नाही का?

भाऊजी म्हणाले, •••

मुलांच्या दृष्टीने त्यांनी सुचवलेला निर्णय तसा बरोबर आहे. आता आपली काळजी त्यांना आहेच.

अग!! तू आजूबाजूला बघतेस ना, परिस्थिती कशी बिकट आहे ते?

आपली मुलं आपल्याला विचारतायेत. हे कमी आहे का? विचार करूया.

खरंय, ••••

*घरात जिवंत माणसाबरोबर नीट बोलायला मुलांना वेळ नसतो. आणि मेलेल्या माणसाला हलवून हलवून विचारतात तू बोलत का नाहीस म्हणून?? मेल्यानंतर दान धर्म पण भरपूर करतात. **

समाजातील हे एक कटू सत्य तर आहेच.

बरे असो,

बघूया मंगला ताई काय म्हणतात ते??

पूढच्याच आठवड्यात सर्वांची एकत्र video conference झाली. आपापसात चर्चा झाली. एकत्र राहण्याचे प्लस माइनस पोइंट डिस्कस झाले.

मुलांच्या दृष्टीने, त्यांच्या सोईसाठी, ताई भाऊजी, मंगलाताई सर्वांनी होकार दिला.

लगेचच येथे चार बेडरूम चां मोठा फ्लॅट घेतला. सर्व सोयी केल्या, स्वयंपाकाला मावशी, इतर कामांना मावशी, एका ड्रायव्हरची सोय झाली. सर्वांना त्यांच्या मनाप्रमाणे जगण्याचे स्वातंत्र्य असणार आहे. सर्व सुख सोयींनी सज्ज घर अजय अनिताने ताईच्या हातात दिले.

काही झालं तरी अनिताच्या आईकडे लक्ष देणे गरजेचे आहेच.

म्हणतात ना, •••

**Communicating is one thing but your tone and your way while communicating is everything. ** 

हे सर्व व्यवस्थित पार पडल‌, कारण अजय अनिताने योग्य पद्धतीने हा प्रश्न हाताळला. योग्य शब्दात सद्य परिस्थिती, प्रश्न व त्या प्रश्नाचे समाधान सांगीतले. परिस्थितीला तोंड देण्यासाठी सर्वांच्या दृष्टीने हा निर्णय कसा बरोबर आहे, हे समजावून सांगितले.

तसंही म्हणतात ना, •••

Every one goes through bad days/difficult phase in life. Don’t give up. Pause, Rest, Rethink, Reset and Restart. Always choose the best option and move on.

It is your decision not condition which shape your life.

तसेही आपण सर्व नेहमीच तडजोड करत असतोच. घरी, बाहेर, नोकरीत सर्व ठिकाणी. त्याशिवाय आपण समाजात आनंदाने जगूच शकत नाही. आयुष्याचे गणित सोडवताना आपण असे बरेच निर्णय घेतो, ज्याचे side effects आपल्याला नंतर फेस करावेच लागतात.

आज उच्च शिक्षित अजय आपल्या बुद्धी, शिक्षणाच्या जोरावर अमेरिकेत नोकरी करातोय. जेंव्हा अजय अमेरिकेत गेला, तेंव्हा जग जिंकल्याचा आनंद झाला होता ताईला. एका मध्यम वर्गीय कुटुंबासाठी ही अभिमानाची गोष्ट आहे. तर त्याच आनंदाचा side effect ताई भाउजींना आज दिसतोय.

माझ्या म्हातारपणी माझी मुलं माझ्या जवळच असावी, हा विचार आपल्या स्वार्थासाठी कोणतेही आईवडील कधी करतील का‌??

भारतात नोकरी करणारी मुलं तरी नेहमीच आईवडिलांच्या सेवेला हजर असतात का? कसं शक्य आहे ते?

अशी अपेक्षा करणे बरोबर आहे का?

तेंव्हा आज अजय अनिताने आपल्या आईवडिलाना जो alternate option दिला तो सर्वांनी सहर्ष स्वीकार केला.

खूपदा *वेळ/ काळ / वय * आपली परीक्षा घेत असत.

आता पूढे काय? या प्रश्नाने आपल्यापैकी अनेकांचे आयुष्य, अनेक ज्येष्ठांचे जीवन चिंताग्रस्त करून ठेवले आहे.

मग हा निर्णय बरोबरच आहे.

अस म्हणता येईल का? निर्णय धाडसी आहे. पण सर्वांच्या प्रश्नाचे समाधान होत असेल तर काय हरकत आहे?

भाऊजी म्हणजे एक Balanced व्यक्तिमत्व सद्य परिस्थितीला ओळखून, दुसऱ्यांना समजून, समजावून योग्य निर्णय घेणार.

आज त्याच धाडसी निर्णयाचे *success Celebration* आहे.

*आत्मविश्वास *तडजोड * माझ्या बरोबर तुम्ही पण आनंदी रहाव. * 

*तुम भी चलो हम भी चले. चलती रहे जिंदगी।**

 हा विचार कोणत्याही समस्येवर मात करू शकतो. समाधान शोधू शकतो.

This Positive approach/ attitude and confidence can solve any problem.

शेवटी असंच म्हणावस वाटत, •••

**ए वक्त तू कितना भी परेशान करले हमें, पर याद रख••• किसी मोड़ पे तुझे भी बदल देंगे हम। **

© सुश्री संध्या बेडेकर 

वारजे, पुणे.  

7507340231

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ मनाचे श्लोक – एक सार्वकालिक ‘मनोपनिषद’… – श्लोक क्र. १ आणि २ ☆ श्री विश्वास देशपांडे ☆

श्री विश्वास देशपांडे

? इंद्रधनुष्य ?

☆ मनाचे श्लोक – एक सार्वकालिक ‘मनोपनिषद’… – श्लोक क्र. १ आणि २ ☆ श्री विश्वास देशपांडे ☆

मनाचे श्लोक – एक सार्वकालिक ‘मनोपनिषद’ – 

– – श्लोक पहिला 

मनाच्या श्लोकांतील पहिला श्लोक मंगलाचरणाचा आहे. कोणत्याही महान कार्याचा प्रारंभ मंगलभावनेने होणे ही भारतीय परंपरा आहे. समर्थ रामदासांनीही मनाच्या या महाग्रंथाची सुरुवात गणेश व शारदा यांच्या वंदनाने केली आहे.

गणाधीश जो ईश सर्वा गुणांचा |

मुळारंभ आरंभ तो निर्गुणाचा |

नमू शारदा मूळ चत्वार वाचा |

गमू पंथ अनंत या राघवाचा ||

अर्थ : जो गणांचा अधिपती आहे, जो सर्व गुणांचा स्वामी आहे आणि निर्गुण परब्रह्माचा मुळारंभ आहे, अशा श्रीगणेशाला वंदन. तसेच परा, पश्यंती, मध्यमा आणि वैखरी या चारही वाणींचे मूलस्रोत असलेल्या देवी शारदेला नमस्कार करून आपण राघवाच्या—ईश्वराच्या—अनंत मार्गावर वाटचाल सुरू करूया.

कोणतेही कार्य सिद्धीस जाण्यासाठी ईश्वरकृपेची आवश्यकता असते. म्हणूनच प्रत्येक शुभकार्याचा प्रारंभ श्रीगणेशाच्या मंगलस्तवनाने केला जातो. समर्थांनीही मनाच्या श्लोकांचा प्रारंभ श्रीगणेशाच्या नमनाने केला आहे. श्रीगणेश हा विघ्नहर्ता आहे—तो अडथळे दूर करतो, मार्ग सुकर करतो आणि साधकाचे रक्षण करतो.

समर्थ श्रीगणेशाला “सर्वा गुणांचा ईश” म्हणतात. येथे केवळ सत्त्व, रज, तम हे त्रिगुण अभिप्रेत नाहीत, तर चांगले–वाईट, त्याज्य–ग्राह्य असे सर्व गुण येतात. मुळात सृष्टीत कोणतीही गोष्ट स्वतःहून चांगली किंवा वाईट नसते; तिचा उपयोग आपण कसा करतो, यावर तिचे स्वरूप ठरते. अग्नी स्वयंपाकासाठीही उपयोगी पडतो आणि जाळण्यासाठीही. शस्त्र एखाद्याला जखमी करू शकते, तसेच शस्त्रक्रियेतून प्राण वाचवूही शकते. दैनंदिन व्यवहारात त्याज्य मानले जाणारे विष अनेक रोगांमध्ये औषध ठरते. सृष्टीत शुद्ध तत्त्वच विराजमान आहे आणि त्या तत्त्वांचा अधिपती गणपती आहे.

गणेशवंदनेनंतर समर्थ विद्येची देवता असलेल्या शारदेचे—सरस्वतीचे—स्मरण करतात. “नमू” हा शब्द गणेश आणि शारदा या दोघांनाही उद्देशून आहे. दैनंदिन जीवनात असो वा अध्यात्ममार्गावर, प्रगतीसाठी ज्ञान अत्यावश्यक आहे; आणि ज्ञानाची अधिष्ठात्री देवता म्हणजे शारदा. तिच्या कृपेअभावी कोणतेही ज्ञान संपादन शक्य नाही.

शब्दाचे मूळ स्फुरण परा, त्याचा भावार्थ पश्यंती, त्याचा नाद मध्यमा आणि प्रत्यक्ष उच्चार वैखरी—या चारही वाणींचे मूलस्थान शारदा आहे. कोणत्याही वाङ्मयाची, विचारांची किंवा अभिव्यक्तीची निर्मिती तिच्याशिवाय शक्य नाही. म्हणूनच समर्थांनी या मनोपनिषदाच्या प्रारंभी शारदेला वंदन केले आहे. शारदाच आदिमाया, आदिशक्ती आहे.

या वंदनाचा हेतू स्पष्ट आहे—आपली ही वाटचाल निर्विघ्नपणे पार पडावी. आपल्याला ज्या मार्गावर चालायचे आहे, तो मार्ग म्हणजे श्रीरामांचा मार्ग. येथे श्रीराम म्हणजे केवळ दशरथपुत्र नव्हे, तर परमात्मस्वरूप. हा मार्ग अनंत आहे, न संपणारा आहे. या मार्गावर स्वयं भगवान शंकरही चालत आहेत; तेही अखंड रामनामाचा जप करत आहेत.

समर्थांचे दैवतच श्रीराम आहे. ते स्वतःला रामदास म्हणतात—रामाचे दास. श्रीराम जणू त्यांना प्रत्यक्ष समोर उभे दिसतात. म्हणूनच ते म्हणतात, “गमू पंथ अनंत या राघवाचा. ” या अनंत मार्गावर चालण्यासाठी समर्थ श्रीगणेश आणि शारदेचे आशीर्वाद मागतात—आणि ते आशीर्वाद आपल्यासाठीही आहेत.

आपणही भक्तिभावाने त्यांना वंदन करून, या राघवाच्या अनंत मार्गावर चालण्यासाठी सज्ज होऊ या.

आत्मचिंतनासाठी – – – 

  • कोणत्याही कार्याची सुरुवात करताना माझ्या मनात मंगलभाव आहे का, की केवळ घाई?
  • माझ्यातील गुणांचा उपयोग मी साधनेसाठी करतो की बंधनांसाठी?
  • शब्दांच्या पलीकडे जाऊन त्यामागील भाव आणि अर्थ समजून घेण्याचा मी प्रयत्न करतो का?
  • श्रीरामांचा “अनंत मार्ग” हा माझ्यासाठी बाहेरचा आहे की अंतर्मनातून सुरू होणारा?

– – –

– – श्लोक दुसरा

मना सज्जना भक्तीपंथेची जावे |

तरी श्रीहरी पाविजेतो स्वभावे |

जनी निंद्य ते सर्व सोडोनि द्यावे |

जनी वंद्य ते सर्वभावे करावे ||

अर्थ : हे सज्जन मना, तू भक्तीमार्गानेच वाटचाल कर. त्या मार्गावर चालल्यास तुला निश्चयाने परमेश्वराची प्राप्ती होईल. समाजासाठी घातक ठरणाऱ्या गोष्टींचा त्याग कर आणि समाजहिताची, कल्याणकारी कर्मे पूर्ण भावाने आचर.

या श्लोकात समर्थ रामदासांनी मनाला “सज्जन” असे संबोधले आहे, हे अत्यंत अर्थपूर्ण आहे. एखाद्याला सज्जन म्हटले, की त्याच्याकडून सज्जनासारखेच वर्तन अपेक्षित धरले जाते. कदाचित म्हणूनच समर्थांनी मनाला सज्जन म्हटले असावे—मनावर विश्वास ठेवत, पण त्याचबरोबर त्याला जबाबदारीची जाणीव करून देत.

मन स्वभावत: चंचल आहे. त्याच्या असंख्य वाटा आहेत. परंतु त्या सर्व वाटांमधून अंतिमतः हितकारक ठरणारी वाट म्हणजे भक्तीमार्ग—हे समर्थ येथे ठामपणे सांगतात.

ईश्वरप्राप्तीसाठी ज्ञानमार्ग, कर्ममार्ग आणि भक्तीमार्ग असे तीन मार्ग सांगितले जातात. त्यापैकी सर्वसामान्य माणसाला सहज आचरता येणारा, जीवनाशी सलग राहणारा आणि व्यवहारात उतरवता येणारा मार्ग म्हणजे भक्तीमार्ग. म्हणूनच सर्व संतांनी एकमुखाने भक्तीमार्गाचे महत्त्व प्रतिपादित केले आहे. समर्थही येथे तेच सांगतात—भक्तीमार्ग हा सरळ, सोपा आणि थेट ईश्वराकडे नेणारा आहे.

खरं तर जीव हे परमेश्वराचेच स्वरूप आहे; पण अज्ञानामुळे तो त्या परमेश्वरापासून दूर गेलेला असतो. जेव्हा जीव भक्तीमार्गावर चालू लागतो, तेव्हा ईश्वर त्याच्यासमोर उभा राहतो—ईश्वर संमुख होतो. आणि एकदा का ईश्वर संमुख झाला, की त्याच्या चरणांपर्यंतची वाटचाल आपोआप सुरू होते. म्हणूनच समर्थ येथे “भक्तीपंथ” हा शब्द वापरतात. हा केवळ विचारांचा नव्हे, तर प्रत्यक्ष चालण्याचा—आचरणाचा—मार्ग आहे.

या श्लोकातील तिसरी आणि चौथी ओळ विशेष अर्थपूर्ण आहे—

जनी निंद्य ते सर्व सोडोनि द्यावे |

जनी वंद्य ते सर्वभावे करावे”

येथे ‘जनी’ म्हणजे केवळ सामान्य लोक असा अर्थ अभिप्रेत नाही. जनी म्हणजे समाजातील सज्जन, विचारवंत, ऋषितुल्य व्यक्ती—ज्यांच्या विवेकावर आणि आचरणावर समाज उभा राहतो. अशा सज्जनांना जी गोष्ट निंद्य वाटते, ती आपण टाळावी; आणि जी गोष्ट त्यांना वंद्य, म्हणजेच आदरणीय वाटते, ती पूर्ण भावाने आचरावी—हा या ओळींचा गाभा आहे.

आजच्या समाजजीवनात अनेक गोष्टी रूढ झालेल्या दिसतात. काही प्रथा, सवयी किंवा उत्सव साजरे करण्याच्या पद्धती काळानुसार बदलल्या आहेत. त्या सर्वच चुकीच्या आहेत असे नाही; पण त्या आपल्या संस्कृतीला, सामाजिक भानाला आणि संवेदनशीलतेला पूरक आहेत का, याचा विचार करणे आवश्यक आहे. लग्नसमारंभात आणि इतर वेळी डीजेचा वापर करणे, फटाके फोडणे, वाढदिवस प्रसंगी केक कापणे आणि दिवे विझवणे इ. सज्जन आणि विचारवंतांच्या दृष्टीने ज्या गोष्टी योग्य वाटतात, ज्या समाजात सुसंस्कार वाढवतात, अशाच गोष्टींचा अंगीकार करणे—आणि ज्यामुळे समाजात विकृती, उथळपणा किंवा अनावश्यक अतिरेक वाढतो, अशा गोष्टी टाळणे—हेच समर्थ येथे सूचित करतात.

आपण इतरांनी केले म्हणून काही करायचे नसते. ज्या गोष्टी इतरांनी केल्या तर आपल्याला अस्वस्थ वाटते, त्या आपणही करू नयेत. आणि ज्या कृतींमुळे इतरांच्या मनात आनंद, समाधान किंवा प्रेरणा निर्माण होते, अशा कृती आपण कराव्यात. आधी स्वतः आचरणात आणले, मग सांगितले—हेच खरे नैतिक बळ आहे.

परमेश्वरप्राप्तीसाठी समर्थ ज्या भक्तीमार्गाचा उपदेश करतात, त्या मार्गावर चालण्यासाठी मन आणि आचरण शुद्ध असणे अत्यावश्यक आहे. मन शुद्ध नसेल आणि आचरण स्वच्छ नसेल, तर भक्ती केवळ बाह्य स्वरूपाची राहते. म्हणूनच संतांनी आणि सज्जनांनी ज्या गोष्टी त्याज्य ठरवल्या आहेत त्या टाळणे, आणि ज्या गोष्टी आचरणात आणायला सांगितल्या आहेत त्यांचा स्वीकार करणे—हे भक्तीमार्गावरील यशस्वी वाटचालीचे खरे गमक आहे.

आत्मचिंतनासाठी – – 

समर्थ मला “सज्जन मना” म्हणतात—मी स्वतःकडून तशी अपेक्षा ठेवतो का?

.. माझ्या दैनंदिन जीवनात भक्ती ही केवळ भावना आहे, की आचरणाचा मार्ग?

.. सज्जनांना निंद्य वाटणाऱ्या कोणत्या गोष्टी मी अजूनही सवयीने करत आहे का?

.. माझ्या कृतींमुळे समाजात सुसंस्कार वाढतात की केवळ गोंधळ?

 – क्रमशः – श्लोक १ आणि २.

© श्री विश्वास देशपांडे

चाळीसगाव

प्रतिक्रियेसाठी ९४०३७४९९३२

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ ती ‘आत्महत्या ‘ नव्हती – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – श्री सुनीत मुळे ☆

श्री सुनीत मुळे

 

? इंद्रधनुष्य ?

☆ ती ‘आत्महत्या ‘ नव्हती – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – श्री सुनीत मुळे 

… ती ‘आत्महत्या ‘ नव्हती… तो तुमच्या-आमच्या घरातल्या ‘मोबाईल’ने केलेला ‘मर्डर’ होता!

धप्प… धप्प… धप्प!

रात्रीचे २:३० वाजले होते.

गाझियाबादच्या एका सोसायटीतल्या ९ व्या मजल्यावरून तीन कोवळे देह खाली कोसळले.

– आणि त्यानंतर… सगळं संपलं.

– खाली रक्ताचा सडा आणि वर फक्त एक भयानक, जीवघेणी शांतता.

– – त्या रिकाम्या झालेल्या घरातल्या बेडवर आता फक्त तीन बाहुल्या पडल्या आहेत… पण त्या बाहुल्यांशी खेळणाऱ्या त्या १६, १४ आणि १२ वर्षांच्या चिमुरड्या हातांनी मात्र कायमची exit घेतली.

त्यांनी का जीव दिला?

गरिबीमुळे? .. नाही.

त्रास होता म्हणून? .. नाही.

– – त्यांना मारलं तुमच्या-आमच्या घरातल्या एका लाडक्या ‘पाहुण्याने’… ज्याचं नाव आहे ‘मोबाईल’!

टीव्ही ९ मराठीची बातमी वाचली आणि डोकं सुन्न झालं.

– – पोलिसांनी जे सांगितलंय, ते ऐकून पायाखालची जमीन सरकेल.

– त्या मुली ‘व्हर्च्युअल गेम’ च्या जाळ्यात अशा अडकल्या होत्या की, त्यांना वास्तवातले – रक्ताचे आई-बाबा ‘दुश्मन’ वाटू लागले होते.

– – पालकांनो, हा फक्त ‘गेम’ नाही, हा ‘डिजिटल मर्डर’ आहे!

तुम्हाला वाटतंय, “माझं पोरगं हा गेम खेळत नाही, मी सेफ आहे? “

– गैरसमज काढून टाका डोक्यातून! हा गेम तर फक्त एक निमित्त आहे.

– – तुमच्या मुलाच्या हातातला ‘इन्स्टा रील्स’, ‘स्नॅपचॅट’ आणि ‘फ्री फायर’ हे सुद्धा त्यापेक्षा कमी नाहीत.

तुमच्या घरातली मुलं ‘जिवंत’ आहेत की ‘झोम्बी’ झालीत? बघा हे ३ सीन ओळखीचे वाटतात का :: 

१. “आई, तू गप्प बस ना! ” (लाज वाटणे):

– – जरा बघा मुलांकडे…

– तुमच्या मुलाला आता आईच्या हातचं साधं ‘वरण-भात’ किंवा ‘पोळी-भाजी’ नकोशी वाटते… आणि बाहेरचं ‘पिझ्झा-बर्गर’ किंवा ‘चायनीज’ भारी वाटतं?

– त्याला सणावाराला भारतीय कपडे घालायची किंवा तुमच्यासोबत बाहेर यायची लाज वाटते?

… सावधान! ते मूल शरीराने तुमच्या घरात आहे, पण मनाने ‘परदेशात’ गुलाम झालंय. त्याला स्वतःच्या रक्ताचाच तिरस्कार वाटू लागलाय.

२. डोळ्यात जीव नाही (The Zombie Stare):

– – तुम्ही मुलाला हाक मारता… एकदा, दोनदा, तीनदा. पण ते मान वर करत नाही. त्याचे डोळे स्क्रीनवर असे चिकटलेले असतात की, जगात काय चाललंय याचं भान नसतं.

– ते बाळ तुमच्यासमोर बसलंय, पण ते तिथे नाहीच आहे!

– त्याची नजर जिवंत माणसासारखी नाही, तर एखाद्या ‘झोम्बी’ सारखी झालीय.

– हे बघून तुमचं काळीज तुटत नाही का?

३. जेवणाचं टेबल की ‘स्मशान शांतता’?

– – घरातला हा सीन बघा, डोळ्यात पाणी येईल:

ताटात जेवण वाढलेलं आहे. पण जोपर्यंत आई युट्यूबवर व्हिडिओ लावून मोबाईल हातात देत नाही, तोपर्यंत पोरगं अन्नाचा घासही गिळत नाही.

आई आपल्या जगात, पोरगं मोबाईलच्या जगात.

एकाच छताखाली राहून आपण एकमेकांसाठी ‘अदृश्य’ झालोय.

घरात वाय-फाय फुल्ल आहे, पण संवाद ‘झिरो’ आहे.

– – जबाबदार कोण?

त्या तीन निष्पाप मुली? अजिबात नाही.

– – जबाबदार आपण आहोत!

– आपण आपल्या कष्टाचा स्मार्ट फोन त्यांच्या हातात दिला, पण बोलायला ५ मिनिटं वेळ दिला नाही.

– आपण त्यांना ‘अनलिमिटेड डेटा’ दिला, पण संस्कार मात्र ‘लिमिटेड’ दिले.

– आपणच आपल्या हाताने त्यांच्या बालपणाचा ‘सौदा’ केलाय.

उद्याची बातमी आपल्या शहरातली नको असेल तर…

– जेवताना स्क्रीन बंद: नियम म्हणजे नियम. अन्नाचा मान राखा, नात्याचा मान राखा. घास भरवताना आईचा स्पर्श हवा, स्क्रीन नको.

– मातीशी जोडा: त्यांना सांगा की इन्स्टावरचं जग खोटं आहे. मैदानातला घाम आणि घरातली माणसं खरी आहेत.

– मित्र बना: मुलांच्या जगात ‘पोलीस’ म्हणून नाही, तर ‘मित्र’ म्हणून शिरकाव करा. “तुला यात काय आवडतं? मला पण शिकव, ” हे प्रेमाने विचारा.

गाझियाबादच्या त्या तीन चिमुकल्या जीवांनी स्वतःचा बळी देऊन आपल्याला एक धडा दिलाय.

आज रात्री एक गोष्ट नक्की करा: 

जेव्हा तुमची मुलं गाढ झोपली असतील, तेव्हा त्यांच्या खोलीत जा.

त्यांच्या कपाळावर हळूच हात ठेवा आणि बघा…

हे तेच डोकं आहे का ज्याला आपण मांडीवर घेऊन थोपटायचो? की हे डोकं आता कोण्या ‘गेम’ने हायजॅक केलंय?

… त्यांना जवळ घ्या. त्यांना तुमची गरज आहे… मोबाईलची नाही.

वेळ जाण्याआधी सावध व्हा… 

ही पोस्ट आताच Save (Collection) मध्ये टाकून ठेवा. जेव्हा जेव्हा तुम्हाला वाटेल की मुलांचं मोबाईलचं वेड हाताबाहेर जातंय, तेव्हा हे पुन्हा वाचा. तुम्हाला ‘नाही’ म्हणायची ताकद मिळेल.

एक कळकळीची विनंती: ही पोस्ट फक्त वाचू नका. तुमच्या वॉलवर फॉरवर्ड करा किंवा तुमच्या जोडीदाराला (नवरा/बायको) खाली टॅग करा. एका शेअरमुळे एखाद्या घरातला हरवलेला संवाद पुन्हा सुरू होऊ शकतो.

लेखक : अज्ञात  

प्रस्तुती – श्री सुनीत मुळे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ Empathy… – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – सौ. गौरी गाडेकर ☆

सौ. गौरी गाडेकर

📖 वाचताना वेचलेले 📖

☆ Empathy… – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – सौ. गौरी गाडेकर

एका दुकानदाराने आपल्या दुकानाच्या बाहेर पाटी लावली होती –

“कुत्र्याची पिल्ले विकणे आहेत. “

लहान मुलांना अशा पाट्या लगेच आकर्षित करतात.

थोड्याच वेळात एक लहान मुलगा दुकानात आला आणि विचारले,

“काका, या पिल्लांची किंमत काय आहे…? “

दुकानदार म्हणाला,

“बाळा, ही पिल्ले खूप चांगल्या जातीची आहेत. साधारण ३००० ते ५००० रुपयांपर्यंत आहेत. “

त्या लहान मुलाने खिशात हात घातला,

काही चिल्लर नाणी बाहेर काढली आणि मोजली.

तो हिरमुसला होऊन म्हणाला,

“काका, माझ्याकडे फक्त ५० रुपये आहेत. पण… पण मी फक्त ती पिल्ले बघू शकतो का…? “

दुकानदार हसला आणि त्याने शीळ घातली.

दुकानाच्या आतल्या खोलीतून एक कुत्री बाहेर आली आणि तिच्या मागे पाच गोंडस,

कापसाच्या गोळ्यासारखी पिल्ले धावत बाहेर आली.

ती पिल्ले एकमेकांशी खेळत होती,

उड्या मारत होती.

पण…

त्या मुलाचे लक्ष त्या धावणाऱ्या पाच पिल्लांकडे नव्हते.

त्याचे लक्ष मागे हळूहळू,

लंगडत चालत येणाऱ्या सहाव्या पिल्लाकडे गेले.

ते पिल्लू इतर पिल्लांच्या वेगाने धावू शकत नव्हते,

ते फरफटत चालले होते.

मुलाने उत्साहाने विचारले,

“काका, त्या छोट्या पिल्लाला काय झालंय…?

ते का लंगडतंय…? “

दुकानदार म्हणाला,

 “अरे, ते जन्मतःच तसं आहे.

डॉक्टरांनी सांगितलंय की त्याच्या पायाचं हाड नीट नाहीये.

ते कधीच नीट चालू शकणार नाही.

ते आयुष्यभर असंच लंगडत राहणार. “

 

हे ऐकून तो मुलगा आनंदाने ओरडला,

“काका, मला तेच पिल्लू हवंय…!

मी तेच विकत घेणार…! “

दुकानदार आश्चर्यचकित झाला.

तो म्हणाला,

“बाळा, तू वेडा झाला आहेस का…?

जर तुला तेच पिल्लू हवं असेल,

तर मी तुला ते फुकट देईन.

कारण त्या लंगड्या पिल्लाची काहीच किंमत नाही.

ते कोणालाच नको असतं. “

हे ऐकताच तो लहान मुलगा एकदम शांत झाला.

त्याचा चेहरा रागाने लाल झाला.

त्याने दुकानदाराच्या डोळ्यात बघून बोट दाखवत ठामपणे सांगितले,

“तुम्ही मला ते पिल्लू फुकट देऊ नका.

त्या पिल्लाची किंमत तितकीच आहे,

जेवढी त्या इतर चांगल्या पिल्लांची आहे.

आणि मी तुम्हाला त्याचे पूर्ण पैसे देईन.

आता ५० रुपये घ्या,

आणि उरलेले पैसे मी तुम्हाला रोज थोडे-थोडे जमा करून आणून देईन. “

दुकानदार म्हणाला,

“पण बाळा, तुला हेच लंगडं पिल्लू का हवंय…?

ते तुझ्यासोबत धावू शकणार नाही,

खेळू शकणार नाही… “

 

त्यावर त्या मुलाने काहीच उत्तर दिले नाही.

त्याने फक्त हळूच आपली पॅन्ट वर केली.

त्याचा एक पाय पूर्णपणे वाकडा होता आणि त्याला ‘स्टीलचा सपोर्ट’ (कॅलिपर) लावलेला होता.

त्याला स्वतःलाही नीट चालता येत नव्हते.

 

मुलाने मान वर केली आणि दुकानदाराला म्हणाला,

“काका, मलासुद्धा कुठे नीट धावता येतं…?

आणि त्या पिल्लाला अशा कोणाची तरी गरज आहे…

जो त्याची वेदना समजून घेईल…! “

दुकानदार निःशब्द झाला.

त्याच्या डोळ्यात पाणी आले.

त्याने काउंटरवरून उतरून त्या मुलाला मिठी मारली.

जगाला अशा लोकांची गरज नाही, जे एकमेकांची ‘लायकी’ किंवा ‘किंमत’ ठरवतात.

जगाला अशा लोकांची गरज आहे,

जे दुसऱ्याचं दुःख स्वतःचं समजून स्वीकारतात.

सहानुभूती (Empathy) ही सर्वात मोठी शक्ती आहे.

लेखक : अज्ञात

प्रस्तुती : सौ. गौरी गाडेकr

संपर्क – 1/602, कैरव, जी. ई. लिंक्स, राम मंदिर रोड, गोरेगाव (पश्चिम), मुंबई 400104.

फोन नं. 9820206306

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – प्रतिमेच्या पलिकडले ☆ # जागते रहो… # ☆ श्री नंदकुमार पंडित वडेर ☆

श्री नंदकुमार पंडित वडेर

? प्रतिमेच्या पलिकडले ?

☆ # जागते रहो… # ☆ श्री नंदकुमार पंडित वडेर 

मालकिन बाई जाग्या व्हा जाग्या व्हा… मध्यान रातीचा चांदवा डोईवर आलाय म्हंजी धनी घराकडं येन्याचा टाईम झालाय… आता येत असत्याल सोसायटीच्या मेन गेटवरून कधी लेफ्ट कधी राईट कडं झुकत.. तो गेटवरचा आगाऊ वाॅचमन बहाद्दूर बारा बेण्याचा हाय.. तो सायबास्नी ततचं आडवून ठूतो आणि सतराशेसाठ वंगाळ वंगाळ प्रश्न इचारून लै बैजार करून सोडतो… सायबास्नी आधीच लै चढलेली आनी त्यात ह्याची चवकशी… इचालरयं काय सायेब उत्तर काय देतात.. कश्याचा कशाला मेळच जमयाचा नाही.. तवा सायेबाचं टकूर सटाकलं मग बोलतात ये लै श्यान्या कोन पिलयं रं तू का मी… मगं माझ्यापेक्षाही तूच लै बडबडतोय कश्यापायी… गपगुमान गेट उघड मला माझ्या घराकडं जायाच़ आहे.. आधीच लै लेट झालाय… त्यात रोजचा हा खुटानात वाढूळ टाईम होतो… अन घरी गेल्यावर आमचा सिलेंडरचा स्फोट होतो… च्यामायला आमच्या पुरूषाची काही बी मर्दानगीची जिंदगीच राहिली नाही… अन तू रं माकड तोंड्या बेन्या.. रातच्याला गपगुमान शेपुट अंगाभवती गुंडाळून डोळं झाकून पडून राहयचं सोडून.. अगदी माझ्या येन्याच्या वेळेलाच जीव तोडून नि घसा फोडून जो भुंकायचा बिगुल वाजवून समंद्या सोसाटीला जाग आणतूस… मला काय चोर समजतोस काय रं तू रोज… इतकी वर्षे इथं राहतूय मला काय अजून बी वळखंना व्हयं रं… ये तू सकाळच्या पारी बटर नि बिसकुट खायच्या येळेला या चौकात… मग दावतू तुला चांगलाच धतुरा… आगाऊ भा*खाव मला वळखंत न्हाई… माजलास गड्या तू… माझ्यापेक्षा मालकिनीची लै काळजी घेतोस… तरीच म्हटलं मी सोसायटीच्या आत शिरतो न शिरतो तोच माझ्या फ्लॅटमध्ये दिवाळी सारखा चकाचक लाईटाचा उजेड कसा काय पडतू… तो तू बिगुल वाजवून मालकिनीला मी आल्याची वर्दी देतूस व्हयं रं… तरी बरं अजून माझं टकूरं ताळ्यावर असतयं… इतकं पिऊन तर्र होऊन बी मी आपल्या घराकडं बरोबरच जातू… अजून एकदा बी दुसऱ्याच्या घराची इतक्या रातच्याला बेल मारून झोप मोड केली न्हाई… अन तशी केली असती तर मला सोसाटीतनं कधीच हाकलला असता… थू तुझ्या कुत्र्या माझ्याशी बेईमानी करतोस अन मालकिनीला इमानदारी दावतोस… अरं तुझ्या मुळीच ती रात्री अपरात्रीला जागं होऊन माझ्याबरोबर भांड भांडून भुस्कट पाडते… अन मला तर त्या वक्ताला डोळ्यावर आलेली झोपेची झिंग नि खंबेवर खंबा संपवून जड झालेल्या डोक्यात चढलेली नशा यातनं काय बी बोलायचं सुधरतचं न्हाई… सारखं आपलं मॅडमला आय ॲम सो साॅरी.. ओके गुडनाईट याच्या पुढं गाडी सरकतच न्हाई… बाहेरच्या बाल्कनीत हा देह जाऊन पडतो तेव्हा निजानंदी तल्लीन होतो… मग दिवसा कधी जाग येते तेव्हा माझी बोलती बंद असते… कान उघडेच असतात नि बायको तिकडून एके फोरटी सेव्हनच्या फैरीवर फैरी झाडत राहते… मी कधीच शहीद झालेला असतो… पण तिचं समाधान काही झालेलं नसतं… आता आजपासून दारूच्या वाटेला जानार न्हाई नि रोज रातच्याला जंटलमन सारखं वेळेवर घराकडं येईन अशी जातमुचलक्यावर सुटका होते… अन रात्र झाल्यावर पुन्हा माझा मी राहतच नसतो.. मी देवदास होऊन जातो नि मन आधीच पोहचलेले असते मागाहून पायही तिकडेच वळतात… चार दिन कि जिंदगी है अपनी तो अपनेही हिसाबसे जियेंगे.. कल हो न हो… म्हणत एकेक जाम का प्याला रिचवत जातो… बार बंद झाल्यावर बाहेर आणून टाकतात मला तेव्हा भानावर येतो अरे बापरे लै रात्र झाली गड्या… गडाचे दरवाजे तर बंद झाले असतीलच… पण त्याशिवाय दुसरा कुठलाच थारा नसल्यानं पुन्हा पुन्हा इथचं यावं लागतयं… काय करणार साली जिंदगीभी ही ऐसी है… जिना यहा मरना यहा इसके सिवा जाना कहा… आणि तू कुत्र्या तर माझ्या वाईटावर टपकलेलाच असतो… मी लांबून येतानाचा वास आला कि तू जो केकटायला लागतोस बेंबीच्या देठापासून… घरातनं एकदा बायकोनं कायमचं हाकलून दिल्यावर का मलापन तुझ्यासारखं रस्त्यावर आलेलं बघितलं की तुझं समाधान हुनार आहे असा तर तुझा डावं नसंल ना!

©  श्री नंदकुमार इंदिरा पंडित वडेर

विश्रामबाग, सांगली

मोबाईल-99209 78470 ईमेल –nandkumarpwader@gmail.com

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ मला समजलेली संत तुकारामांची गाथा… भाग – ८ … ☆ सुश्री अरुणा मुल्हेरकर ☆

सुश्री अरुणा मुल्हेरकर

? विविधा ?

☆ मला समजलेली संत तुकारामांची गाथा… भाग – ८ ☆ सुश्री अरुणा मुल्हेरकर ☆

अभंग वाणीतून कळलेले संत तुकाराम

अत्यंत तळमळीने पांडुरंगाची भक्ती करताना संत तुकाराम विठ्ठलाशी एकरूप झाले आहेत आणि वेळोवेळी त्यांच्या मुखातून जी अभंगवाणी निघाली आहे त्यातून आपल्यासारख्या साधक भक्तांना तुकाराम महाराजांच्या व्यक्तिमत्त्वाच्या अनेक पैलूंचे दर्शन घडत गेले आहे.

आता तरी पुढे/ हाचि उपदेश/

नका करू नाश/ आयुष्याचा//

सकाळच्या पाया/ माझे दंडवत/

अपुलाले चित्त/ शुद्ध करा//

हित ते करावे/ देवाचे चिंतन/

करूनिया मन/ एक विध//

तुका म्हणे लाभ/ होय तो व्यापार/

करा काय फार/ शिकवावे//

तुकाराम महाराज व्यवसायाने वाणी(व्यापारी) होते. त्यामुळे भक्तांना उपदेश करताना, ज्यामध्ये तुमचे हित आहे, असाच व्यापार तुम्ही करावा असे ते बोलतात. या ठिकाणी व्यापार या शब्दाचा अर्थ कर्म असाच घेणे योग्य ठरेल.

अर्थात स्वहिताचे कर्म करावे.

*शरणागत झालो/ तेणे मी पणा मुकलो//

आता दिल्याचीच वाट/ पाहू नाही खटपट//

नलगे उचित/ काही पहावे संचित//

तुका म्हणे सेवा/ माने तैसी करू देवा//

या ठिकाणी संसारातून मुक्त झाल्याची त्यांची अवस्था दिसते. त्यांच्यातील मी नष्ट होऊन परमेश्वरा जवळ त्यांनी पूर्णतया शरणागती पत्करली आहे. परमेश्वर जे देईल त्याचीच वाट पाहणे आहे असे ते म्हणतात. संचिता पासून सुखाची अथवा दुःखाची प्राप्ती होवो, त्यांना काही फरक पडत नाही. परमेश्वराची सेवा हा एकच त्यांचा ध्यास आहे.

खऱ्या अर्थी तुकाराम जाणून घ्यायचे असतील तर त्यांचे हे खालील १३ अभंग वाचले पाहिजेत. ते काय म्हणतात बघा…

कपट काही एक/ नेणे भुलवायाचे लोक//

तुमचे करितो कीर्तन/ गातो उत्तम ते गुण//

दावू नेणे जडी बुटी/ चमत्कार उठा उठी//

नव्हे मठपती/ नाही चाहूरांची वृत्ती//

नाही देवार्चन / असे मांडीले दुकान//

नाही वेताळ प्रसन्न/ काही सांगो खाणखूण //

नव्हे पुराणिक/ करणे सांगणे आणिक//

नाही जाळीत भणदी / उद्धव म्हणोनी आनंदी//

नेणे वादा घटा पटा/ करिता पंडित करंटा//

नाही हलवीत माळ/ भोवते मिळवूनी गबाळ//

आगमीचे नेणे कुडे / स्तंभन मोहन उच्चाटणे //

नोहे त्यांच्या ऐसा/ निरथवासी पिसा/

१) लोकांना कसे फसवावे, हे कपट मी जाणत नाही.

२) मी फक्त कीर्तन करतो आणि कीर्तनातून देवा, फक्त तुमचे गुणगान करतो.

३) लोकांना नादी लावणे हा माझा उद्देश नाही, म्हणून एखादी मुळी काढण्यासारखा कोणताही चमत्कार मी कधीच करत नाही.

४) माझे कोणीही शिष्य नाहीत, की जात वारा, मी माझे मोठेपण समाजात प्रस्थापित करण्याचा प्रयत्न करेन.

५) मी मठाधिपती नाही किंवा मला कोणतीही जमीन इनाम मिळालेली नाही.

६) धूप, दीप, गंधादी पुजा अर्चनेच्या कोणत्याही गोष्टींचे दुकान मांडून मी पसारा घातलेला नाही.

७) काही लोकांच्या खाणाखुणा सांगणारा कोणताही वेताळ माझ्यावर प्रसन्न नाही.

८) पुराणाचा आधार घेऊन लोकांना एक सांगावे आणि व्यवहारात वेगळेच वागावे असा ढोंगी पुराणिक मी नाही.

९) अंबाबाईच्या नावाने उदो करत डोक्यावर अग्नीचे खापर जाळणे मला माहित नाही.

१०) घटाकाश, मटाकाश, तंतू आणि पट असे जे वेदांतातील दृष्टांत आहेत त्यांचा अनुवाद करणारा करंटा पंडित मी नाही.

११) लोकांना भवती जमवून आणि त्यांच्यात बसून जपमाळ ओढण्याचे ढोंग करणाऱ्यातला मी नाही.

१२) वेदातील जारण, मारण, उच्चाटन इत्यादी प्रयोग मला माहित नाहीत.

१३) हरीच्या भक्ती वाचून इतर प्रकार करणारा नरकवासी वेडा मी नाही.

तुकाराम महाराज हे फक्त तनाने आणि मनाने हरीचे दास आहेत, भक्त आहेत.

संत तुकाराम एक प्रापंचिक माणूस, साधना करताना त्यांचे मन मध्येच साशंक होते. आपली भक्ती खरी आहे की मी भक्तीचे ढोंग!! करतो आहे अशी शंका त्यांच्या मनात उत्पन्न होते आणि ते अस्वस्थ होतात. पांडुरंगाला सांगतात…

गातो भाव नाही अंगी/ भूषण करावया जगी//

परी तू पतित पावन/ करी साच हे वचन//

मुखे म्हणावितो दास/ चित्ती माया लोभ आस//

तुका म्हणे दावी वेष/ पैसा अंतरी नाही लेश //

ते या अभंगात स्वतःचे दोष वर्णन करतात.

हे हरी, मी तुझे नाव घेतो, परंतु त्यासाठी योग्य असा भक्ती भाव माझ्यापाशी आहे का? जगात माझा लौकिक वाढावा म्हणून तर मी हे नामस्मरणाचे ढोंग करत नाही ना? अशी स्वतःविषयी ते शंका घेतात. तू पतीत पावन आहेस, तेव्हा तूच मला माझ्या चुकीतून सावर. मी जेव्हा माझ्या भक्त असण्याचे दाखवतो, स्वतःला तुझा दास म्हणवितो, तेव्हा मला असे वाटते की भक्तीचा लेशही माझ्यात नसून माझ्या चित्तात अजूनही माया मोह लोभ आहे.

देवाला तुकारामांची ही प्रामाणिक कबुली आहे.

भक्तीचा महिमा इतका अपार आहे, की त्यामुळे तुकाराम महाराज आणि पांडुरंग यांच्यातील द्वैतभाव हळूहळू कमी होत चालला आहे. महाराज म्हणतात,

बाहिर पडलो/ आपुल्या कर्तव्ये /

संसाराची जीवे/ वेटाळीलो//

एका मध्ये एक/ नाही मिळो येत/

ताक नवनीत/ निवडिले//

झाली दोन्ही नामे / एकची मथनी/

*दुसरीया गुणी/ वेगळाली//

तुका म्हणे दाखविली/ मुक्ताफळी/

शिम्पलेची स्वस्थळी/ खुंटलीया//

महाराज स्वतःची स्थिती या अभंगात वर्णन करतात. त्यांचे म्हणणे असे आहे की, केवळ या जीवदशेमुळे जन्म, मृत्यू, आणि संसार यात ते गुंतून पडले आहेत. पण आता प्रयत्नपूर्वक या सर्वातून बाहेर पडत आहेत. ताकापासून निघालेले लोणी ज्याप्रमाणे ताकात पुन्हा मिसळणे अशक्य, त्याचप्रमाणे आता एकदा संसारातून बाहेर पडल्यावर त्यात पुन्हा अडकणे नाही. एकाच्याच मंथना पासून वेगळ्या गुणांमुळे सार व असार हे दोन भाग झाले आणि त्यास दोन नावे पडली. एकदा मोती शिंपल्यातून वेगळा काढल्यावर त्याला पूर्ववत शिंपल्याशी जोडता येत नाही.

तुकाराम महाराजांची स्थिती या शिंपल्यातून बाहेर काढलेल्या मोत्यासारखी झाली आहे.

मोक्ष तुमचा देवा/ तुम्ही दुर्लभ तो ठेवा/

माझी भक्तीची आवडी/ नाही अंतरी ते गोडी//

आपल्या प्रकारा/ करा जतन दातारा/

तुका म्हणे भेटी/ पुरे एकची शेवटी//

तुकारामांना मोक्षाची हाव नाही. तो दुर्लभ आहे. ते देवाला सांगतात की देवा, मोक्ष काय आहे तो तुझ्यापाशीच ठेव. मला फक्त तुझ्या भक्तीची आवड आहे. तुझ्या भेटीसाठी माझा जीव व्याकुळ झाला आहे.

तुकाराम महाराजांच्या मनस्थितीची कल्पना या अभंगातून वाचकांना येते.

५००० अभंगाच्या या गाथेत वेळोवेळी तुकाराम महाराज आपल्या नजरेसमोर सतत उभे राहतात. त्यांच्याविषयी पुढील लेखात अजून जाणून घेऊ.

 क्रमशः…  

© सुश्री अरुणा मुल्हेरकर 

डेट्राॅईट (मिशिगन) यू.एस्.ए.

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ शुभं करोती की मालिका…? ☆ सुश्री अर्चना दादासाहेब मुळे ☆

सुश्री अर्चना दादासाहेब मुळे

⭐ मनमंजुषेतून ⭐

☆ शुभं करोती की मालिका…? ☆ सुश्री अर्चना दादासाहेब मुळे☆

शुभं करोती कल्याणं

आरोग्यम धनसंपदा..

हातपाय धुऊन देवासमोर दिवा लावण्याची, शुभंकरोती म्हणण्याची संध्याकाळची वेळ आजकाल कुणी पाळत नाही. कारण यावेळी घराघरातील ‘इडियट बाॅक्स’ रंगीबेरंगी प्रकाशाच्या दिव्यानी भिंती उजळवून टाकतो. त्यातील भावना प्रेक्षकांच्या हृदयात घर करतात. नायकांबरोबर रक्ताच्या नात्यांपेक्षा जास्त जवळीक निर्माण करतात. एखाद्या करमणूकप्रधान मालिकेतील कलाकार हसतात तेव्हा प्रेक्षकही हसतात. मालिकेत नायिका रडते तेव्हा प्रेक्षक भगिनींचा पदर, रूमाल डोळ्याला लागतो. खलनायिका कट कारस्थान करते तेव्हा प्रेक्षक रागाचं टोक गाठतात. मध्यमवर्गीय कौटुंबिक कथानक भाव खातं. तर भक्तीचं कथानक भक्त तयार करतं. संतांच्या मालिका सुरू झाल्या की भक्तगणात पूर्वीच्या तुलनेत नक्कीच वाढ झाली. त्याचबरोबर ऐतिहासिक मालिका प्रचंड लोकप्रिय होतात. याचं कारण भारतात दूरदर्शन पाहणार्‍यांची संख्या खूपच जास्त आहे. इथं दूरदर्शन हे मनोरंजनाचं सर्वात मोठं माध्यम आहे. भारतातील प्रेक्षकांच्या भावनांचा ‘रिमोट कंट्रोल’ मालिकातील पात्रांच्या हातात आहे. पात्रांच्या उद्याच्या स्वप्नाबरोबर आपलं स्वप्न रंगवणं हे भारतीय प्रेक्षकांकडून सवयीने घडतं. प्रेक्षकांचा स्वभाव घडण्यात मालिकांचा प्रचंड मोठा हात आहे.

‘रामायण’ ‘महाभारत’ ‘मालिका यायच्या तेव्हा प्रेक्षक दूरदर्शन संचाला हळदी कुंकू लावायचे. रामाचा प्रवेश झाला तर औक्षण करायचे. तेव्हा लोक घराबाहेर पडत नसत. भक्ती उफाळून यायची. रावण आणि कौरवांचा राग मनामनात रूजला गेला.

काही वर्षांपूर्वी सासू सुनेवर आधारीत एक मालिका सुरू होती, तेव्हा मालिका सुरू असताना नवरा घरी आला तर त्याने त्याला हवं ते आपापलं घ्यायचं. त्यावेळी चहा, पाणी असं काहीही मागायचं नाही. असा कित्येक घरातला नियम होता.

अलिकडच्या काही मालिकांमधील घरात ज्याचं चुकतं त्याला शिक्षा करण्याचा नियम असतो. प्रत्यक्षात एका सुनेने कामात असल्याने सासर्‍यांचा फोन उचलला नाही तर त्यानी दहा दिवस तिचा फोन काढून घेतला.

अशा गंमतीजमती आजूबाजूला घडतात तेव्हा प्रेक्षकांची मानसिकता बदलली की बिघडली असे प्रश्न पडतात. मोबाईलवर मालिका पाहणार्‍यांची संख्या सुद्धा मोठी आहे. सतत हा आरशासारखा दिसणारा दूरदर्शन, त्याचंचं प्रतिबिंब प्रेक्षकांच्या मनावर पडावं याची पुरेपूर काळजी घेतो. मग प्रेक्षकांची मानसिकता बिघडली तर…?

पात्रांची चिंता – मालिकेतील पात्राचा अपघात झाला. पात्र बदलण्याची वेळ आली, आर्थिक अडचणी आल्या तर प्रेक्षकांची चिंता वाढते. त्याचं आता काय होणार या विचाराने ते चिंताग्रस्त होतात.

मानसिक शक्तीचा र्‍हास – स्वत:च्या वास्तव दैनंदिन जीवनाकडे दुर्लक्ष होतं. मालिका बघून दैनंदिन जीवनातील कडवट आठवणीना विसरण्याचा प्रयत्न केला जातो. त्यामुळं वास्तवापासून दूर पळण्याची सवय लागते. खर्‍या आयुष्यातील समस्या हाताळण्याचं कौशल्य विकसित होत नाही. मानसिक शक्तीचा र्‍हास होतो.

भावनांचा उद्रेक – मालिकातील आरडा ओरडा, सतत रडणं, सततची षडयंत्र बघून विनाकारण भावना तीव्र होतात. विशेषकरून याचा ज्येष्ठ नागरिकांवर परिणाम होतो. तसेच मालिकांमधे दिसणारी घरं, कपडे, उदयोग, करोडो रूपयांमधील व्यवहार सगळं ऐकून समाधानाची भावना निर्माण होत नाही. ईच्छा अतृप्त राहायला लागतात. कारण मालिकांमधील सर्व भौतिक सुखांबरोबर प्रेक्षक तुलना करायला लागतात. नात्यातलं प्रेम कळेनासं होतं. धारणांचं निश्चयीकरण व्हायला लागतं. सासू अशीच असते. सून तशीच असते. अशा धारणा तयार होतात.

मालिका म्हणजे बाजारपेठ – मालिका प्रेक्षकाना गुंतवून ठेवतात. मधेमधे येणार्‍या जाहिराती प्रेक्षकांच्या मनात घर करतात. जाहिरातीत असणारी नायिका मुलाना भरपूर प्रोटीन मिळावं, त्याचे कपडे पांढरे शुभ्र असावेत म्हणून काळजी घेते. पाळण्यातल्या बाळापासून आजोबांपर्यंत सगळ्यांचा मोह वाढतो. बाजारातून आपसूक त्या वस्तू घरोघरी येतात. मालिका या जणू बाजारपेठेचं एक साधन होय. खरतर मालिकांमधून एखादी कथा जितकी प्रेक्षकांच्या हृदयाचा ठाव घेते. तितकीच ती प्रेक्षकांची तार्किक विचार करण्याची क्षमता नष्ट करते. मालिका पाहण्यात महिलांचा वेळ वाया जातो असं प्रत्येकीला वाटतं पण तरीही मालिका पाहणं कुणी बंद करत नाही. म्हणून मालिका आपल्या खिशावर राज्य करते. देशाच्या राजकारणावर प्रभाव टाकते. आपण काय पाहतो त्यापेक्षा कंपन्याना काय विकायचं आहे हे मालिकांची बाजारपेठ ठरवते.

टी आर पी – मालिकांमधे सगळ्याच भावनांचं अतिभयंकरीकरण केलेलं दिसतं. एक नायिका असते. एक खलनायिका असते. एक अति सुसंस्कृत, तर दुसरी टोकाची वाईट असते. एकटीचे निर्णय कधीच चुकत नाहीत. ती नेहमी अति सहनशील असते. दुसरी सतत कट कारस्थानच करत असते.

उदा: ठरलं तर मग मधील सायली आणि प्रिया. आपल्या आजुबाजुला सायली इतकं सहनशील, विचारी, कार्यतत्पर, कधीही न चुकणारी अशी सून आणि प्रिया इतकं टोकाचं कट कारस्थान करणारी अशी सून कुठल्याच घरात नसते. पण अशा सुना, त्यात सासू अशी जिला एक सून प्रचंड आवडती असते. दुसरी प्रचंड नावडती असते. असं वास्तवात नसतं. पण घराघरात तसंच दिसायला हवं असतं. म्हणून मालिकांचा टी आर पी वाढतो.

उपाययोजना –

मालिकांची निवड – स्क्रीनच्या मालिकांच्या ढिगार्‍यातून आपल्या आवडीची, सोयीची एखादी मालिका निवडायला हवी. सगळ्या मालिका बघायलाच हव्यात का याचा सारासार विचार करायला हवा. त्यामुळे वेळ वाचेल. चुकीची मानसिकता, भावनिक गोंधळ, विचारांचा ओव्हर लोड कमी करता येईल.

उत्तम समीक्षक व्हा – मालिकांतील पात्रांचा अभ्यास करता येतो. मालिका समीक्षकाच्या भुमिकेतून बघता आली पाहिजे. तार्किक विचार जागृत ठेवले पाहिजेत. भावनांच्या आहारी जाणं थांबवता आलं पाहीजे.

नो टी. व्ही डे – आठवड्यातून किमान एक दिवस टी व्ही न बघण्याचा निर्णय घ्यावा. त्या दिवशी इतर छंदाना वेळ द्यावा. नैसर्गिक डोपामाईन वाढीवर लक्ष द्यायला हवं.

चांगली वाईट मालिका – मालिका बघताना त्यातून चांगलं काय घेता येईल याचा विचार करावा. त्यातील पात्रांवर चर्चा करावी. पात्र वाईट असेल तर ते का वाईट आहे. अशा विचारांची मुलांबरोबर देवाणघेवाण व्हावी.

काय टाळायचं – रडक्या मालिका बघणं बंद करावं. एकटं बसून मालिका बघू नये. झोपण्यापूर्वी थ्रिलर मालिका बघू नये.

च्युईंगम जसं चव संपली तरी चघळली जाते अगदी तसंच मालिका ‘मानसिक च्युईंगम’ सारख्या चिवट होईपर्यंत चघळल्या जातात. शेवटपर्यंत चिकटून राहतात. रबरासारख्या ताणतात. तशी प्रेक्षकांची नाती पण ताणली जातात. नात्यातील कडवटपणा चिघळला जातो. त्यामुळं मानसिक वेळ खर्ची पडतो. वेळ कधीच उलट चक्र फिरवत नाही. वेळ, विचार याना मालिकांच्या ताब्यातून या स्वत:च्या हातात घ्यायला हवं. तरच मन खर्‍या दिव्यातील प्रकाशात तेजोमय, भक्तीमय होईल हेच खरं..!!!

२०२४ – २५ मधील विविध मीडिया रिपोर्ट्स नुसार…

॰ भारतात सुमारे ९० कोटी लोक टी व्ही पाहतात.

॰ भारतात जवळपास २३ कोटी कुटुंबाकडे टी. व्ही आहे.

॰ भारतात ‘स्मार्ट टी व्ही आणि इंटरनेट’ असं जोडून पाहणार्‍यांच्या संख्येत ८५% वाढ झाली आहे.

॰ भारतातील ग्रामीण भागात सध्या प्रेक्षकांची संख्या ४८ दशलक्ष कुटुंबाच्या पार गेली आहे.

॰ भारतातील ६०% पेक्षा जास्त मालिका या नकारात्मक भावनांवर आधारीत असतात.

॰ भारतात पुरुषांच्या तुलनेत मालिका बघण्याचं महिलांचं प्रमाण साधारणपणे ७० ते ७५ % जास्त आहे.

॰ महाराष्ट्रात मराठी मालिका पाहणार्‍यांचे प्रमाण ९०% आहे.

॰ एक सामान्य भारतीय कुटुंब दिवसाला सुमारे ३. ५ तास टी व्ही पाहतं.

॰ विशेषत: जवळजवळ ७५ % महिला प्रेक्षक दुपारी १ ते ५ या वेळेत टी. व्ही पाहतात.

© सुश्री अर्चना मुळे 

समुपदेशन तज्ज्ञ, सांगली

संपर्क – 21 ए बी,पार्श्व बंगला, श्रीवास्तुपूरम, धामणी रोड, सांगली – 416415

फोन – 9823787214 email : archanamulay5@gmail.com

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ उरते फक्त आमसुलाची चटणी… ☆ सौ. पुष्पा चिंतामण जोशी ☆

सौ. पुष्पा चिंतामण जोशी

??

☆ उरते फक्त आमसुलाची चटणी…  ☆ सौ. पुष्पा चिंतामण जोशी ☆

दुपारचा चहा करताना खट् खट् खट् आवाज आला म्हणून खिडकीतून बाहेर पाहिलं तर समोरच्या कंपाउंडमधील भरगच्च हिरव्या पिसाऱ्याच्या फणसाच्या फांद्या तोडण्याचं काम चाललं होतं. झाडावरची पाखरं आजूबाजूला आसरा घेऊन भयचकित नजरेने पाहत होती. थोड्या वेळाने झाडाची भलीमोठी, फणस लगडलेली, जाडजूड फांदी कडाकडा आवाज करत कोसळली. जमीन शहारली. पाखरं भीतीनं दूर उडून गेली. साठ- सत्तर वर्षांचं भारदस्त भक्कम झाड रीतं मुकं झालं. कावळेबुवांनी चार दिवस उरलेल्या झाडावर बसून कर्कश्श निषेध व्यक्त केला. धिटुकल्या चिमण्यांनी पुन्हा काडी- काडी जमवून राहिलेल्या बुंध्यावर घरटी बांधायला घेतली.

सत्तर वर्षांची जुनी घनदाट हिरवी सोबत आठवून काही जण हळहळले. तर खिडकीसमोरची जागा मोकळी झाली म्हणून काही जण सुखावले. काही जण ट्रकभर ओंडके घाईघाईने घेऊन गेले आणि मी माझ्या कामाला लागले.

अनेक दिवस पुढे- पुढे ढकललेलं कपाट आवरायचं काम काढलं होतं. किती ॓पसारा ॔ साठवलाय मी त्यात! आवडलेल्या कवितांच्या जुन्या वह्या, ज्ञानेश्वरीच्या निरूपणाची वर्तमानपत्रातील कात्रणं, मैत्रिणींची पत्र, काही अर्धवट लिहिलेले लेख, काही छापून आलेले लेख, वाचकांची खुशीपत्र… सगळं हाताळताना जाणवलं ॓संध्याकाळ ॔ झालीय. हा मनाचा हिरवा पिसारा आता त्या समोरच्या झाडासारखा छाटून टाकायला हवा. आठवणींच्या फांद्यांवरचे फणसभरले भार कमी करायला हवेत. या साऱ्या पसाऱ्यातून मोकळं व्हायला हवं… सारं कळतंय, पण…

फोन वाजला म्हणून उठले. मैत्रिणीचा फोन होता. मगाशी कपाट आवरायला काढायच्या आधी तिलाच फोन केला होता सहज गप्पा मारायला म्हणून. पण तो उचलला गेला नव्हता. ती म्हणाली,  ॓अगं गाढ झोप लागली होती सुस्तावून. आज आमच्या पुतणसुनेच्या वडिलांचा तेरावा दिवस होता. हल्ली क्रिया कर्म सगळं बाहेरच उरकून घेतात आणि जेवायला हॉलवर बोलावतात. घरात कुणी पसारा घालत नाहीत .॔

 ॓आजारी होते का ते ?॔

 ॓ फार नाही. पण वृद्ध होतेच. सगळा संसार झाला होता आणि लोळत पडण्यापेक्षा… त्यांच्याबद्दलच्या आठवणींची थोडीफार उजळणी झाली आणि सगळेजण जेवायला बसले. इथले तांबे केटरर्स प्रसिद्ध आहेत. अळूच्या भाजीपासून आमसुलाच्या चटणीपर्यंत सगळे पदार्थ अगदी उत्तम झाले होते. सगळेजण मुकाट्याने पण मनापासून जेवले.

 हल्लीच्या धावपळीच्या गतिमान जगात गेलेल्या माणसाच्या थोड्याफार आठवणी तेवढ्या उरतात. कुणाला घराचं म्हातारपण संपल्याचा आनंद वाटतो. झाड तुटल्याची हळहळ असली तरी मोकळं झाल्याची भावना असतेच!॔ मी म्हटलं.

दोन दिवसांनी संध्याकाळी फिरताना वाटेत एक बाई भेटल्या. त्यांचे शेजारी आमच्या चांगल्या परिचयाचे. ते आजोबा नुकतेच गेल्याचं कळलं होतं. त्यांचा एक मुलगा- सून अमेरिकेत असतात. सहज म्हणून त्या बाईंना विचारलं की, ते गेले तेव्हा मुलगा- सून आली होती का?

  ॓छे हो, इतक्या लांबून, एवढा खर्च करून कसं येणार? रजेची व्यवस्थाही व्हावी लागते ना. इकडच्या नातवंडांनी त्यांना तिकडे सगळं काही व्हिडिओवर दाखवलं. त्यांनी तिथून नमस्कार केला. आधुनिक तंत्रज्ञानाचा फायदा. शिवाय इथेही लोकांना ताटकळत बसावं लागलं नाही.

  ॓आता आलीत का ती दोघं? बऱ्याच वर्षात या दोघांची भेट झाली नाहीये म्हणून विचारलं .॔

  ॓आली आहेत. कालच आम्ही तेराव्याला जाऊन आलो. सगळं कॉन्ट्रॅक्टच दिलं होतं. कॉन्ट्रॅक्टरनेच फोल्डिंग टेबलं मांडून, त्यांच्या मोठ्या हॉलमध्ये पानं वाढली.

  ॓चांगलंच की. आता आपल्यालासुद्धा वाकून वाढायला होत नाही.॔

  ॓ पण जेवण मात्र छान होतं.

आमसुलाची चटणी इतकी टेस्टी झाली होती आणि अळूची भाजी… .॔

माझा आपोआप वासलेला आऽऽ बंद करून त्यांना अडवून मी म्हटलं,  ॓एकदा सवडीने भेटायला जाईन त्यांच्याकडे. मुलगा- सून आहेत ना अजून?  ॔

  ॓ हो तर. अहो, आता आईचा प्रश्न सोडवावा लागेल. वाटण्या होतील. थोडी रजा घेऊनच आलीत ती दोघं .॔

मनात म्हटलं ॓बरोबर. तिकडे अमेरिकेत समृद्धीचा भरगच्च हिरवा फणस दारात डोलत असला, तरी इथल्या फणसाचे गरे हक्काचेच.. .॔ 

चालता- चालता एका मैत्रिणीच्या बहिणीची आठवण झाली. तिच्या बहिणीने आयुष्याच्या उत्तरार्धात घरच्या दोन साड्यांव्यतिरिक्त बाहेर जाण्यासाठी फक्त एकच साडी ठेवली होती. नाटकाला जायचं असो की कुठे समारंभाला, तीच एक साडी आणि एक पर्स. बस्.. बाकी सारं तिनं स्वहस्ते वाटून टाकलं होतं.

  ॓नाही बाई… इतकं निरिच्छ व्हायला जमणार नाही.॔ माझ्या मनानं प्रांजळ कबुली दिली. लगेच दुसऱ्या मनानं फटकारलं

॓ इतकं नाही, पण तो गोतावळ्यासारखा इतक्या वर्षांचा पसारा जमवला आहेस, तो तरी मार्गी लावायला हवा. कळलीय ना किंमत? उरते काय तर फक्त आमसुलाची चटणी! ती सुद्धा चविष्ट झाली असली तरच थोड्याफार आंबट गोड आठवणी… .॔ 

दुपारचा चहा करताना सवयीनं खिडकीतून बाहेर पाहिलं तर, समोरच्या फणसाच्या एका उंच गेलेल्या शेलाट्या फांदीवर एक फणस वाऱ्याने डुलत होता. त्याच्या खालची भक्कम फांदी तोडल्यामुळे आता तिथे पोचून फणस काढणं अशक्य होतं,  ॓असू दे. डुलू दे त्याला. त्याची वेळ झाली की तो अलगद गळून पडेल. मग होईल फांदी मोकळी.॔ मनात म्हटलं.

॓आज आत्ता चहा झाल्यावर तीऽऽऽ कपाटाची आवराआवरी करायची ना?॔ दुसऱ्या मनानं आठवण करून दिली.

  ॓बरं आठवलं. उद्या ऑफिस- ग्रुपमधल्या एका मैत्रिणीच्या लग्नाच्या पन्नासाव्या वाढदिवसाला जायचं आहे. लवकरच निघायला हवंय. खूप दिवसांनी सगळ्याजणी भेटल्या की मजा येते. आत्ताच सगळी तयारी करून ठेवायला हवी .॔

आणि तेऽऽऽ आवराआवरीचं काम? दुसऱ्या मनानं थोपवलं.

असू दे. बघू नंतर. होईल ते कपाट मोकळं, त्याची वेळ झाली की. नाही तरी चटणीसाठी आमसूलं भिजत घालायला अजून किती वेळ आहे ते कुणाला माहितेय?

© सौ. पुष्पा चिंतामण जोशी

जोगेश्वरी पूर्व, मुंबई

9987151890

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ ।। श्री नारद उवाच ।। – नारद भक्ति सूत्रे —सूत्र ४५ आणि ४६ ☆ श्री संदीप रामचंद्र सुंकले ☆

श्री संदीप रामचंद्र सुंकले

? इंद्रधनुष्य ?

।। श्री नारद उवाच ।। – नारद भक्ति सूत्रे — सूत्र ४५ आणि ४६ ☆ श्री संदीप रामचंद्र सुंकले 

।। श्री नारद उवाच ।।

भक्तीसूत्र ४५.

तरङ्गायिता अपीमे सङ्गात्समुद्रायन्ती ॥ ४५ ॥

अर्थ : दु:संगानें जडणारे विकार सुरुवातीला जरी मंद लहरींप्रमाणे वाटले तरी त्या दु:संगामुळेच ते सागराप्रमाणे विशाल बनतात.

विवेचन : विकार हे नेहमी सौजन्याचा बुरखा घालून येत असतात असे म्हटले तर वावगे होणार नाही. आपल्याकडे परिणामी जे चांगले असते, त्याला चांगले म्हटले जाते. गुढी पाडव्याला आपण कडुनिंबाची पाने खातो, ती खाताना आपल्याला कडू लागतात, पण अंतिमतः ते आपल्या फायद्याचे असते. विषय सुरुवातीला आपल्याला छान वाटतात, पण अंतिमतः मात्र ते मनुष्याचा घात करतात.

या विकारांची बाधा कळून येत नाही. कारण ते अगदी सूक्ष्म प्रमाणात असतात. पण जसा त्यांना विषयांचा संबंध होत जाईल तसे तसे ते समुद्राप्रमाणे वाढत जातात. अग्नीची ठिणगी लहान असते, पण पेंढ्यांची गंजी जाळायला पुरेशी ठरते.

ज्ञानेश्वर माउली सांगतात.

‘देखे खेळता अग्नि लागला । मग तो न सावरे जैसा उधवला । तैसा इंद्रिया लळा दिधला । भला नोहे ॥’

(द्न्यानेश्वरी ३-२०४)

पारध्यांनी पसरलेले जाळे हरिणास प्रथम बाधक वाटत नाही पण परिणामी त्यातच त्याचा सर्वनाश असतो. जोपावेतो हे विकार तरंगासारखे अल्प परिमाणात असतात तोपावेतो त्यांतील दोषदर्शन न झाल्यामुळे त्यांचा त्याग शक्य असूनही केला जात नाही. मग एकदा का ते समुद्रासारखे विशाल व्यापक झाले की आवरले जाणे शक्य नाही. सागराचा दृष्टांत देण्यात त्याची भयानकता, विशालता दाखविणे हा उद्देश असावा. सागर तरून जाणे जसे कठीण तसेच हे कामक्रोधादि विकार तरून जाणेही कठीण आहे.

आपण समाजात राहतो. समाजातील बऱ्यावाईट माणसांशी आपला संबंध येणे अगदीच स्वाभाविक आहे. पण त्या वाईट लोकांचा गुण आपल्या अंगी येणार नाही, यासाठी आपण दक्ष रहाण्याची नितांत गरज आहे. काही लोकं घराच्या वाशासारखे असतात, त्यांना टाळणे शक्य नसते. मग त्यांना सोबत घेऊनच जीवन जगावे लागते. यासाठी विशेष दक्षता घ्यावी लागते. क्रोध आणि काम या प्रमुख विकारांवर आपण ताबा मिळविला तर अर्धे मैदान जिंकले असे समजायला हरकत नाही.

जय जय रघुवीर समर्थ

—– 

नारद भक्तिसूत्र ४६

कस्तरति कस्तरति मायाम्? यः सङगान्स्त्यजति यो

महानुभावं सेवते, निर्ममो भवति ॥ ४६ ॥

अर्थ : माया तरुन कोण जातो? मायेच्या पार कोण जातो? जो आसक्तींचा त्याग करतो. जो ममत्व रहित होतो. (तोच मायेच्या पलिकडे जातो.

विवेचन : मागील सूत्रातून दुःसंग हा कसा बाधक आहे व कामादिकांच्या द्वारे सर्वनाशास कारण आहे हे सांगितले. पण या सर्व विकारांचा समूल नाश झाला पाहिजे. केवळ कामक्रोधादिकांचा नाश झाला पण त्यांचे मूळ जी माया ती राहिली तर तिच्यापासून पुन्हा सर्व संसार निर्माण होण्यास वेळ लागणार नाही. म्हणून माया-तरण झाले पाहिजे. ते कोण करू शकतो याचा विचार या सूत्रात केला आहे. प्रथम माया म्हणजे काय पाहिले पाहिजे. उपनिषदे, पुराणे, स्मृती, गीता व संत-वाङ्‍मयातून, तसेच शास्त्रकारांच्या दर्शन-ग्रंथातून मायेचा फार विचार केला आहे. मायेचीच अविद्या, प्रकृती, प्रधान, कल्पना, संसार, भ्रम इत्यादी नावे आढळतात.

समर्थ म्हणतात,

*”माया दिसे परी नासे । वस्तु न दिसे परी न नासे । माया सत्य वाटे परी मिथ्या असे । निरंतर ॥”*

(दास. १४. १०. ०१)

शुद्ध चैतन्याला जीवदशेत आणून संसारात अडकवणारी ती माया असे श्री ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितले आहे.

*”तैसे भूतजात सर्व । हे माझेचि कीर अवयव । परि मायायोगे जीव । दशे आले ॥”*

(ज्ञा. ७-६६)

मायेच्या दोन महत्त्वाच्या शक्ती आहेत. आवरण आणि विक्षेप. आवरणशक्तीने चैतन्याच्या विशेष स्वरूपास झाकून ती त्याला आपल्या स्वरूपाचा विसर पाडते हेच अज्ञान.

*”आपुला आपणपया । विसरू जो धनंजया । तेचि रूप यया । अज्ञानासी ॥”*

(ज्ञा. १४-७१.)

ही माया आपल्या विक्षेपशक्तीने ब्रह्मांडस्वरूप सर्व सृष्टी उत्पन्न करते. तसेच जीवाला देहद्वयाचा अहंकार घ्यावयास लावून त्याच्या ठिकाणी कर्तृत्व भोर्क्तृत्वादी धर्माचा तादात्म्य अध्यास निर्माण करते; असे वेदांतग्रंथांतून म्हटले आहे. माया ही भगवंताची सद्‍सद्विलक्षण अशी अनिर्वचनीय शक्ती आहे.

जीवाला दुःख शोकात्मक संसार भोगण्याचे कारण केवळ मायाच आहे असे श्री ज्ञानेश्वर महाराज सांगतात.

*”दुःख शोकाचिया घाई । मारिलिया सेचि नाही । हे सांगावया कारण काई । जे ग्रासिले माया ॥”*

(ज्ञा. ७-१०७)

वरील सूत्रात ‘तरति’ हे क्रियापद घेतले आहे ते महत्त्वाचे आहे. तरणे ही क्रिया एखाद्या मोठ्या नदीतून पोहून पलीकडे जाणे, तिचे अतिक्रमण करणे या अर्थी होत असते. गीतेमध्येही सातव्या अध्यायात ‘मायामेतां तरन्ति ते’ असे म्हटले आहे. पोहणे ही क्रिया एखाद्या नदीतून, सामान्य जलाशय, तळे, विहीर, इत्यादिकांतून होत असते. ती अल्पकाळ श्रमपरिहाराकरिता होते. पण पोहणे व तरणे यांत अंतर आहे. जलाशय, तळे, विहीर इत्यादिकांत पोहणारा जेथे पोहण्यास प्रारंभ करतो तेथेच परत येतो. पण तरून जाणे म्हणजे एका तीराहून निघून मधला पाण्याचा भाग ओलांडून परतीराला जाणे. याकरिता महानदी किंवा समुद्रच घ्यावा लागतो. तरुन जाण्यासाठी तर वापरली जाते. आपण सगळे या भवनदीत, अर्थात भवसागरात आहोत असे सर्व संत सांगतात. या मायेला जिंकल्याशिवाय हा भवसागर तरुन जाणे शक्य नाही. भगवंत म्हणतात,

*”माझी ही त्रिगुणी दैवी माया न तरवे कुणा| कासेस लागले माझ्या ते चि जाती तरुनिया|| “*

(गीताई ०७. १४)

अंतरंग व बहिरंग असे संगाचे दोन प्रकार आहेत. बहिरंग स्त्री, पुत्र, वित्त, गृहक्षेत्रादी व अंतरंग काम-क्रोध, लोभ, अहंकारादि हे दोन्हीही जीवाला परमात्म्याकडे जाऊ देत नाहीत. वास्तविक वर पुत्र, वित्त, कलत्रादी विषय बहिरंग म्हटले आहेत. जोपावेतो देह आहे तोपावेतो यांचाही संबंध राहील, मग त्याग कसा होणार? येथे संपूर्ण विषयांचा त्याग हा अर्थ अभिप्रेत नाही. कारण स्वरूपाने ते बाधक नाहीत. बाधक अंश संग म्हणजे आसक्ती, अभिनिवेश, अहंत्व, ममत्व, प्रियत्वबुद्धी होय. तीच साधकाला घातक असते, त्या आसक्तीचा त्याग म्हणजेच संगत्याग होय, पण या विषयांच्या ठिकाणी अनेक जन्माचा संबंध असल्यामुळे नित्यत्व बुद्धी, सुखरूपतेची बुद्धी, अनुकूल बुद्धी असते. केवळ मनच काय पण अंतःकरणचतुष्ट्य सर्व त्या विषयात रंगून जाते. असा हा संग दृढ झालेला आहे.

असे जरी आहे तरी जेव्हा अंतःकरणात विवेक निर्माण होतो तेव्हा अंतःकरण, बुद्धी, विषय यांचे अनित्यत्व पटते व एक वेळा अनित्यत्व, अनात्मत्व पटले म्हणजे तो साधक पुन्हा त्यात अडकला जात नाही. तो विवेक महात्म्यांच्या कृपेविना प्राप्त होऊ शकत नाही.

येथे ‘संगान्स्त्यजति’ असे बहुवचन आहे. संगाचे अंतरंग व बहिरंग असे दोन प्रकार वर सांगितले आहेत. बाह्यसंग काही अवांतर कारणाने म्हणजे दोषदृष्टीने सुटू शकतील पण फार बाधक असणारे अंतरसंग हे विना विवेक ज्ञानाच्या टाकले जाणार नाहीत. याकरिता ”यो महानुभावं सेवते” हे वाक्य सूत्रात आले आहे. येथे ‘महानुभाव’ हा शब्द महत्त्वाचा आहे. मागे अडतीस व एकूणचाळिसाव्या सूत्रात ‘महत्’ पद संतांच्याकरिता वापरले आहे. त्यांनाच येथे महानुभाव असे म्हटले आहे. महान म्हणजे मोठा आहे अनुभव ज्यांना, त्यांना महानुभाव म्हणावे. अनुभव हा एक जीवनाचा स्थायीभाव आहे. जीवनातून अनुभव वगळता येणार नाही. जीवन हे अनुभवस्वरूप असते. अनुभव हा एक ज्ञानाचा प्रकार आहे. मुख्य ज्ञानाचे दोन प्रकार वेदान्तशास्त्रात सांगितले आहेत. स्मृती आणि अनुभव. प्रमाणापासून झालेल्या ज्ञानास अनुभव म्हणतात व अनुभवापासून जे संस्कार होतात त्या संस्कारांपासून जे ज्ञान होते ते स्मृतिज्ञान होय.

अनुभवातही यथार्थ-अयथार्थ, प्रमा अप्रमा (भ्रम) असे प्रकार आहेत. योग्य प्रमाणाने योग्य विषयाचे जे यथार्थ ज्ञान होते त्यास प्रमा म्हणजे यथार्थ ज्ञान म्हटले जाते. जेव्हा प्रमाणात दोष शिरतो, विषय अयोग्य असतो म्हणजे बाधित असतो. त्याचे जे ज्ञान ते अप्रमा (भ्रम) म्हटले जाते. दोरीवर जर एखाद्याला सर्पज्ञान झाले तर तो भ्रम होय. कारण तो दोरीच्या अज्ञानाने इंद्रियदोषादिकांमुळे झालेला असतो व कालांतराने राहत नाही म्हणजे सर्पभ्रम बाधित होतो. म्हणून तो अनुभवही बाधित, अप्रमा, भ्रम म्हटला जातो. संसारात काही अनुभव प्रमाणभूत म्हणजे खरे असतात व काही अनुभव अप्रमा म्हणजे भ्रमरूप असतात, निष्फल नव्हे बाधक असतात. अनेक विषयांचा अनुभव मनुष्य घेत असतो पण तो टिकत नाही. सुखप्रद होत नाही. तसेच विषय कार्य असल्यामुळे अल्प आहेत. “यदल्पंतन्मर्त्य” जे अल्प ते मर्त्य म्हणजे विनाशी असते असा उपनिषदाचा सिद्धान्त आहे. सामान्यच काय पण इंद्रादिक देवांच्या स्वर्गीय अलौकिक अनुभवालाही तुच्छता आहे. तेही अनुभव घेणारे महान म्हटले जात नाहीत. महान अनुभव म्हणजे ज्या अनुभवाचा विषय मोठा, प्रमाण निर्दोष व अनुभव घेणारा अधिकारी योग्य तो महान एक परमात्माच आहे. याचा विचार मागे आला आहे. त्याचा प्रत्यक्ष तादात्म्याने अनुभव भक्तांना येत असतो.

जलात बुडणार्‍यांना जशी बळकट नौका तारून नेते त्याप्रमाणे या घोर संसारात गटंगळ्या खाणार्‍या जीवास शांत चित्त असलेले ब्रह्मवेत्ते संतच या संसारसागरांतून तरून जाण्याला मोठा आधार असतात.

जन्माला आलेला मनुष्य मरणार आहे, हे अंतिम सत्य आहे. येताना मनुष्य रिकाम्या हाताने येतो, आणि जाताना रिकाम्या हाताने जातो. इथुन जाताना जर तो सर्व गोष्टींची आसक्ती त्यागून जाऊ शकला, तर त्याला मुक्ति मिळण्याची शक्यता असते, असे सर्व संत सांगतात. सर्व संत असे सांगतात की प्रापंचिक मनुष्याला, साधकाला परमार्थ मार्गात पत्नी कधीही अडथळा ठरत नसते, तर तिच्याबद्दल असलेले *ममत्व* त्याला बाधक ठरत असते.

काळोखात मनुष्याला भीती वाटते. पण त्याचवेळी त्याला जर कुठे अग्नी दिसला, तर त्याची थंडी, भय आणि अंधार तिन्ही एकाच वेळी नष्ट होतात. त्यासाठी भगवंताचा आश्रय सर्वोत्तम ठरू शकतो.

जय जय रघुवीर समर्थ

नारद महाराज की जय!!!

– भक्ती सूत्र क्र. ४५ आणि ४६.

© श्री संदीप रामचंद्र सुंकले (दास चैतन्य)

थळ, अलिबाग. 

८३८००१९६७६

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ “वो जफा करे..!” ☆ श्री संभाजी बबन गायके ☆

श्री संभाजी बबन गायके

? इंद्रधनुष्य 

☆ “वो जफा करे..!” ☆ श्री संभाजी बबन गायके

जम्मू-कश्मीर भारताचे अभिन्न अंग आहे, हे जगाला माहित आणि मान्य आहे… पाकिस्तानचा अपवाद वगळता!

पाकिस्तान स्थानिक भारतीय काश्मिरी जनतेला धर्माच्या नावावर भडकावून त्यांना तथाकथित स्वातंत्र्याची मागणी करायला लावत आलेले आहे.

काश्मीरचा काही भाग पाकिस्तानने आधीच बळकावून ठेवला आहे. उर्वरित काश्मीर स्वतंत्र झाला की तो ही पाकिस्तानला जोडून घ्यायचा पाकिस्तानचा डाव जगाला ठाऊक आहे. त्यासाठी पाकिस्तान त्यांच्या प्रशिक्षित अतिरेक्यांना काश्मिरातील घुसवून बंडखोरांना ‘साहाय्य’ करतो. पाकिस्तानी आणि स्थानिक अतिरेकी प्रामुख्याने भारतीय लष्कराला लक्ष्य करतात. अर्थात निष्पाप नागरिकही त्यांच्या कचाट्यातून सुटत नाहीत.

मानवी हक्क आणि इतर नियमांमुळे भारतीय लष्कराला कारवाईमध्ये मर्यादा पडतात. स्थानिक नागरिक लष्कराच्या वाहनांवर, सैनिकांवर दगडफेक करीत असत (हल्ली हे प्रमाण खूप कमी झाले आहे!)… तरीही लष्कराला संयमित कारवाई करीत शांत राहावे लागते. काश्मीरातील जनतेचे मन वळवण्याचा प्रयत्न तरीही भारतीय लष्कर अतिशय नेटाने करीत आलेले आहे. वैद्यकीय, शैक्षणिक, आपत्कालीन सेवांच्या माध्यमातून या प्रयत्नांना उत्तम प्रतिसादही मिळतो आहे. पण यासाठी लष्कर मोठी किंमत देत असते. एकवेळ समोरासमोरचे युद्ध तुलनेने सोपे वाटावे, अशी इथली परिस्थिती आहे! असो.

काल काश्मीरातील एक तरुणी प्रसूती संदर्भातील गुंतागुंतीमुळे अत्यवस्थ झाली. बर्फवृष्टी झाली होती… रस्ते बंद होते. तिला रुग्णालयात नेण्यासाठी पाठवली गेलेली रुग्णवाहिका बर्फात रुतून बसली! इकडे रुग्ण महिलेची परिस्थिती अत्यंत बिकट होत चालली होती. तेथे तैनात असलेल्या सैन्याला ही खबर मिळताच त्यांनी युद्धपातळीवर rescue mission हाती घेतले.

गुडघ्याएवढा बर्फ, बर्फाचे वादळ, अंधार आणि चढ उताराचा रस्ता… आणि अतिरेकी हल्ला होण्याची शक्यता अशा भयावह स्थितीमध्ये जवानांनी त्या महिलेला लाकडी खाटेवर निजवून सुमारे साडे अकरा किलोमीटर्स पायी प्रवास केला… महिलेला रुग्णालयात दाखल केले… आणि तिची सुखरूप सुटका झाली… तिला मुलगा झाला!

भारतीय लष्कराचे कौतुक होत असतानाच दुसऱ्या बाजूला काहींना असे वाटते की… आपले जवान तेथील जनतेला साहाय्य करीत असतात… पण जनता लष्कराला अपेक्षित सहकार्य करीत नाही!

 पण परिस्थिती पूर्णपणे अशी नाही. है इसी में प्यार की आबरू… वो जफा (बेइमानी) करे… मैं वफा करूं! या चालीवर आपण आपला चांगुलपणा सोडायचा नाही…! काळ दखल घेत असतो! हजारो सैनिकांनी प्राणार्पण करीत भारतीय लष्कराची लोकसेवेची परंपरा जतन करून ठेवली आहे… त्यांच्या त्यागाला, बलिदानाला आणि अविरत सेवेला विनम्र अभिवादन! जय हिंद… जय हिंद की सेना!

© श्री संभाजी बबन गायके 

पुणे

9881298260

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares