मराठी साहित्य – जीवनरंग ☆ हे तर ‘जीवनदान’…  लेखक : अज्ञात  ☆ प्रस्तुती – सौ. गौरी गाडेकर ☆

सौ. गौरी गाडेकर

? जीवनरंग ?

☆ हे तर ‘जीवनदान’…  लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – सौ. गौरी गाडेकर

“मॅडम, फुकटचे पैसे नकोत, गजरा घ्या… आज माझा ‘दुसरा वाढदिवस’ आहे! ” सिग्नलवरच्या पोराचे शब्द ऐकून एसी कारमध्ये बसलेल्या करोडपती आईने थेट रस्त्यावरच हंबरडा फोडला!

पुण्यातील चांदणी चौकातील सिग्नलवर दुपारच्या कडक उन्हात गाड्यांची रांग लागली होती. एका आलिशान ‘ऑडी’ (Audi) कारमध्ये ३५ वर्षांच्या ‘अनुराधा’ डोळ्यांवर गॉगल लावून बसल्या होत्या. पण त्या गॉगलच्या आतून त्यांचे डोळे सतत रडत होते.

आज ‘१५ एप्रिल’. बरोबर तीन वर्षांपूर्वी याच दिवशी अनुराधा यांचा ७ वर्षांचा एकुलता एक मुलगा, ‘अंश’ एका भयंकर अपघातात त्यांना सोडून गेला होता. अंश ‘ब्रेन डेड’ (Brain Dead) झाला होता, आणि एका धाडसी निर्णयापोटी अनुराधा आणि त्यांच्या पतीने अंशचे सर्व अवयव (Organs) दान केले होते. आज अंशचा स्मृतिदिन होता. अनुराधा अत्यंत निराश अवस्थेत अनाथाश्रमाला देणगी देऊन घरी परतत होत्या.

– – तो सिग्नलवरचा प्रसंग आणि एक १० वर्षांचा मुलगा :

सिग्नल लाल झाला. उन्हाच्या झळा लागत होत्या. तेवढ्यात एक १०-११ वर्षांचा, घामाने डबडबलेला पण अत्यंत गोड चेहऱ्याचा मुलगा अनुराधा यांच्या कारच्या काचेवर टकटक करू लागला. त्याच्या एका हातात मोगऱ्याचे गजरे होते आणि दुसऱ्या हातात पाण्याचा रिकामा ग्लास.

अनुराधा यांना भयंकर चिडचिड झाली. त्यांनी रागाने काच थोडी खाली केली आणि पर्समधून ‘५० रुपयांची’ नोट काढून त्याच्या अंगावर फेकत म्हणाल्या,

“हे घे पैसे आणि जा इथून! मला कोणताही गजरा नकोय, आणि मला कुणाशीही बोलायचं नाहीये. “

पण त्या मुलाने ती ५० ची नोट उचलली नाही. तो अत्यंत स्वाभिमानाने काचेजवळ आला आणि म्हणाला,

“मॅडम, माझी आई म्हणते की फुकटचे पैसे कधीही घेऊ नयेत, त्याने पाप लागतं. मी भिकारी नाहीये, तुम्ही एक गजरा घ्या, मगच मी हे ५० रुपये घेईन. “

त्याच्या आवाजातील निरागसपणाने अनुराधा यांचे लक्ष वेधून घेतले. त्यांनी डोळ्यांवरचा गॉगल काढला आणि त्या मुलाकडे पाहिले. त्याचा चेहरा खूप शांत आणि हसरा होता.

अनुराधा यांनी विचारले, “एवढ्या उन्हात तू गजरे का विकतोयस? शाळा नाहीये का तुझी? “

– – तो सत्याचा स्फोट आणि अश्रूंचा बांध फुटलेला क्षण :

मुलगा गोड हसून म्हणाला,

“शाळा सकाळची असते मॅडम. पण माझी आई लोकांची धुणी-भांडी करते. माझ्या आईवर खूप मोठं कर्ज आहे, म्हणून मी तिला मदत करतो. आणि तसंही मॅडम… आज माझा ‘दुसरा वाढदिवस’ आहे! “

अनुराधा यांना काहीच समजले नाही. “दुसरा वाढदिवस? म्हणजे काय? “

मुलगा शर्टाची कॉलर थोडी बाजूला करत छातीवरची एक मोठी ‘सर्जरीची खूण’ (Operation Mark) दाखवत म्हणाला,

“मॅडम, तीन वर्षांपूर्वी माझ्या हृदयात भोक होतं. डॉक्टर म्हणाले होते मी मरणार! माझ्या आईने कर्ज काढून मला पुण्याला ‘सह्याद्री हॉस्पिटलमध्ये’ आणलं होतं. पण मला कोणीतरी देवदूत भेटला! बरोबर तीन वर्षांपूर्वी, ‘१५ एप्रिलला’ एका लहान मुलाचा अपघात झाला होता… आणि मॅडम… त्या मुलाचं धडधडणारं ‘हृदय’ (Heart) डॉक्टरांनी माझ्या छातीत बसवलं! त्या देवासारख्या मुलाने मला जीवन दिलं, म्हणून आज माझा दुसरा जन्मदिवस आहे! “

… हे शब्द ऐकताच अनुराधा यांच्या पायाखालची जमीनच सरकली! त्यांचा श्वास अक्षरशः कोंडला गेला! ‘सह्याद्री हॉस्पिटल’, ‘१५ एप्रिल’ आणि ‘हृदय प्रत्यारोपण’…

अनुराधा यांनी थरथरत्या आवाजात विचारले, “बाळा… तुझं नाव काय आहे? “

मुलगा म्हणाला, “माझं नाव कबीर आहे मॅडम. “

– – काळजाला भिडणारा क्लायमॅक्स :

अनुराधा यांनी स्वतःच्या डोक्याला हात लावला. तीन वर्षांपूर्वी त्यांनी स्वतःच्या अंशचे हृदय ज्या ‘कबीर’ नावाच्या गरीब मुलाला दान केले होते… तोच कबीर आज त्यांच्या गाडीसमोर उभा होता!

अनुराधा वेड्यासारख्या गाडीचा दरवाजा उघडून भररस्त्यात खाली उतरल्या. त्यांनी त्या घामाने डबडबलेल्या कबीरला दोन्ही हातांनी घट्ट धरले. त्यांच्या डोळ्यांतून धाय मोकलून अश्रू वाहत होते.

“कबीर… बाळा, मला फक्त एक गोष्ट करू दे… ” असे म्हणत अनुराधा यांनी आपले कान आणि डोके कबीरच्या छातीवर ठेवले.

धड-धड… धड-धड…

त्या गरीब मुलाच्या छातीत आज अनुराधा यांच्याच पोटच्या गोळ्याचे, त्यांच्या ‘अंशचे’ हृदय धडधडत होते! ज्या हृदयाचे ठोके तीन वर्षांपूर्वी थांबलेत असे त्यांना वाटले होते, ते ठोके आज या रस्त्यावर एका स्वाभिमानी मुलाच्या छातीत जिवंत होते!

… अनुराधा भररस्त्यात गुडघ्यावर बसून ढसाढसा रडू लागल्या. त्यांनी कबीरला घट्ट मिठी मारली. सिग्नल हिरवा झाला होता, गाड्यांचे हॉर्न वाजत होते, पण एका आईला आज तिचा हरवलेला देवदूत परत मिळाला होता!

त्याच दिवशी अनुराधा यांनी कबीरच्या आईला शोधून काढले. त्यांच्या डोक्यावरचे हॉस्पिटलचे संपूर्ण कर्ज एका झटक्यात फेडून टाकले आणि कबीरच्या शिक्षणाची संपूर्ण जबाबदारी स्वतःच्या खांद्यावर घेतली. कारण एका करोडपती आईचा ‘अंश’ आज एका गरीब पण स्वाभिमानी पोराच्या रूपात जिवंत होता!

… *पैशाचा माज विसरायला लावणारी आणि अवयवदानाचे महत्त्व आणि आवश्यकता याबाबतचा (Organ Donation) एक अत्यंत पवित्र संदेश देणारी ही डोळ्यांत पाणी आणणारी घटना*


लेखक : अज्ञात 

प्रस्तुती : सौ. गौरी गाडेकर 

संपर्क – 1/602, कैरव, जी. ई. लिंक्स, राम मंदिर रोड, गोरेगाव (पश्चिम), मुंबई 400104.

फोन नं. 9820206306

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ नकुशा — भाग – २ ☆ डॉ. ज्योती गोडबोले ☆

डॉ. ज्योती गोडबोले 

? जीवनरंग ❤️

☆ नकुशा — भाग – २ ☆ डॉ. ज्योती गोडबोले 

(आशाला नाशिकला आदिवासी वसतिगृहात सहज प्रवेश मिळाला. आशा तिथे राहून कॉलेजला जाऊ लागली. तिला हे शहर अतिशय आवडलं. आशाला सुलभा स्वप्नाचे ड्रेस देई. आशा ते आपल्या मापाचे करून मस्त वापरत असे. जन्मजात या लोकांना सगळ्यांशी आणि परिस्थितीशी जुळवून घ्यायची असलेली सवय तिला इथे उपयोगीच पडली. आशा बघता बघता बीकॉम झाली. तेही छान मार्क्स मिळवून.) 

इथून पुढे  

आशाला लगेचच राखीव कोट्यातून बँकेत नोकरी मिळाली….. त्यांच्या आदिवासी समाजातली ही पहिली पदवीधारक मुलगी. आशाने सुलभाच्या घरी येऊन नेमणूक पत्र सगळ्यांना दाखवलं. सुलभाच्या पायावर डोकं ठेवलं. गहिवरून म्हणाली, ” बाई, हे सगळं श्रेय तुम्हाला जातं. कोण कुठली दरिद्री आदिवासी मुलगी. तुम्ही भेटला नसतात तर मी तशीच कुजत पडले असते हो त्या पाड्यात. कसे उपकार फेडू तुमचे? ”

सुलभाच्या घरातल्या लोकांनाही गहिवरून आलं. सुलभाच्या सासू सासऱ्यांनी तिला हजार रुपये बक्षीस दिले. , स्वप्नाने सुंदर पर्स. आणि सुलभाने दहा हजार रुपये.

“अशीच मोठी हो बाळा. आता स्वतःच्या पायावर उभी राहिलीस. शाबास तुझी. ”

“बाई, हेच माझं खरं घर आहे. मी तुम्हाला कधीही विसरणार नाही बाई. ” आशा निघून गेली.

आशाला सुलभा बँकेत भेटायची. छानशी साडी नेसलेली, चटपटीतपणे काम करणारी, क्लायंटशी अदबीने बोलणारी आशा बघून सुलभाला फार आनंद व्हायचा.

एक दिवस अचानक आशा सुलभाच्या घरी आली. ” बाई थोडा वेळ आहे का बोलायला? ”

आशा थोडी अस्वस्थ दिसत होती.

“ ये ये ग आशा. बस. आज निवांत आहे बघ मी. कोणी नाहीये घरी. ” सुलभा म्हणाली. आशाच्या हातात पोह्याची डिश देत तिने उत्सुकतेने विचारलं, “ सांग काय काम काढलंस? ”

“ बाई कसं सांगू? ”आशा थोडी थांबली. ” बाई, आमच्या शेजारीच एक कंपनी आहे. तिथला एक मुलगा नेहमी बँकेत येत असतो. खूप छान आहे तो. इंजिनिअर, दिसायला रुबाबदार. मला तो नेहमी भेटायचा बोलायचा. मी गुंतत गेले त्याच्यात. तोही माझ्या प्रेमात पडलाय असं वाटलं मला. तो पण होता माझ्या प्रेमात 

एक दिवस बोलताना मी माझे मागचे दिवस त्याला सांगितले. ”

तो दचकलाच.. “ झोपडीत? तू झोपडीत रहात होतीस? “

मग काहीही न लपवता मी त्याला सगळं सांगितलं… “ मी नकुशा मोरे आहे, आदिवासी आहे. ” 

त्याने हे ऐकलं आणि माझ्याशी सगळे संबंधच तोडून टाकले.

मला म्हणाला “मला वाटलं तू मोरे म्हणजे आमच्यापैकीअसणार.. माफ कर मला आशा. पण आमच्याघरी अशी तुझ्यासारखी आदिवासी मुलगी चालणारच नाही. माझे आजीआजोबा अजून हयात आहेत. या लग्नाला ते जन्मात परवानगी देणार नाहीत. मी त्यांच्या इच्छेविरुद्ध तुझ्याशी लग्न करणार नाही. ”..

… “ आणि असं म्हणून तो सरळ उठून निघून गेला. मी अगदी उध्वस्त झालेय हो. मला काही सुचत नाहीये “ आशा हुंदके देऊन रडायला लागली.

सुलभाने तिला जरा शांत होऊ दिलं. “हे बघ आशा, उत्तम झालं तू त्याला सगळं खरं खरं सांगितलंस.

अग, नंतर काहीतरी वाईट घडण्यापेक्षा हा आधीच नाही म्हणाला हे किती चांगलं झालं. अशी रडू नकोस. वाईट तर मुळीच वाटून घेऊ नकोस. सगळं छान होईल तुझं. देवाने जो कोणी तुझ्यासाठी नेमलेला असेल ना, तो वेळ झाली की समोर येऊन उभा राहील बघ. ” सुलभाने आशाचे डोळे पुसले.

आशा म्हणाली ”बाई, मी आता ती नकुशा म्हणूनही जगत नाहीये आणि आशा म्हणून जगतेय तरी मला माझी जन्माची ओळख असे नवीन आयुष्य जगू देत नाहीये. काय करू मी? ”

“आशा, होईल सगळं नीट. आत्तापर्यंत नाही का सगळं सोसलंस? जिद्दीने शिकलीस, नोकरी मिळवलीस, तसाच छानसा जोडीदार चालत येईल बरं समोर. शांत हो बघू.” 

“ बाई, त्याचं नाही हो वाईट वाटलं मला. माझं लग्न नाही झालं तरीही चालेल पण आता मी ठरवलं आहे.. मी आदिवासी आहे हे कळल्यावर सुद्धा जो मला हो म्हणेल त्यालाच मी स्वीकारीन. ” आणि ती शांतपणे निघून गेली.

– – – त्यानंतर बरेच दिवस गेले.

सुलभाच्या मुलीचं.. स्वप्नाचं लग्न ठरलं. तिच्याच कंपनीत मोठ्या पोस्टवर असलेल्या सागर मुजुमदारशी स्वप्नाने लग्न ठरवलं. अत्यंत आनंदात थाटामाटात स्वप्नाचं लग्न लागलं आणि आता लॉनवर रिसेप्शन चाललं होतं. स्वप्नाच्या आणि सागरच्या ऑफिसमधली बरीच मित्र मैत्रिणी जमून हसत जेवत गप्पा मारत बसले होते. सागरच्या मित्रांखेरीज इतर आणखी बरेच लोकही आले होते. घरचंच लग्न असल्यामुळे आशा सुंदर साडी नेसून, हसतमुखाने वावरत होती. स्वप्नाच्या आजीआजोबांकडे जातीने लक्ष देत होती. त्यांना काय हवं नको बघत होती.

… एक काळासावळा रुबाबदार मुलगा तिच्याकडे सतत बघत होता. आशाचं त्याच्याकडे लक्षच नव्हतं. न राहवून तो शेवटी आशाजवळ येऊन बसला.

“ मी इथं बसलो तर चालेल का? ” त्यानं विचारलं.

“ बसा ना. जेवण झालं का तुमचं? काउंटरवरची गर्दी जरा कमी झालीय. घेऊन या डिश हवं तर. ”आशा म्हणाली.

“ हो हो जातो ना. आणि तुम्हाला गेले दोनतीन दिवस बघतोय मी या लग्नात. मी सागरच्या कंपनीतच आहे. त्याच्याच टीममध्ये. तुम्ही स्वप्नाच्या बहीण आहात का? ”

“ नाही हो मी बहीण नाही पण बहिणीपेक्षा जास्त जवळची आहे या घराच्या ”. एवढं बोलून आशा कोणीतरी हाक मारली म्हणून तिथून निघून गेली.

 दोन दिवसांनी सुलभा आशाच्या बँकेत आली. अचानक बाईना बघून आशाला आश्चर्य आणि खूप आनंद झाला.

“ बाई, आज इकडे कुठे? ”

“ अग जरा तुझ्याकडे काम होतं. कामावरून घरीच ये आज. ” इतकंच बोलून सुलभा निघून गेली.

बँक सुटल्यावर आशा सुलभाच्या घरी गेली. स्वप्ना लग्न होऊन गेल्यामुळे घर कसं उदास वाटत होतं. आजीआजोबा निमूट हॉल मध्ये बसले होते.

“ ये ग बाळा “… सुलभाने तिला बोलावलं. ” अगं तुझ्यासाठी एक मुलगा थांबलाय. त्याला तुझ्याशी बोलायचं आहे… शंकर, बाहेर ये ना. ”

आशाने वळून बघितलं तर स्वप्नाच्या लग्नात तिच्या शेजारी बसलेला तोच तरुण होता.

सुलभाने ओळख करून दिली. ” हा सागरचा मित्र शंकर जाधव. मी जरा बाहेर जातेय. , तुम्ही बोला. ”

शंकरला बघून आशा बुचकळ्यात पडली. याचं आपल्याकडे काय काम असावं असं वाटलं तिला.

तिचा संभ्रम शंकर बघत होता.

“हे बघ आशा. मी तुला सागर स्वप्नाच्या लग्नात दोनतीन वेळा बघितलं. मला तू फार आवडलीस.

… आशाने त्याला मधेच थांबवलं… “ हे बघा. मी आशा मोरे आहे पण मी… “

तिचं वाक्य पूर्ण होण्याच्या आधीच तो म्हणाला.. “ तू आदिवासी आहेस. मला सगळं माहीत आहे. स्वप्नाने सगळं सांगितलं आहे मला. आता मी सांगतो ते ऐक आणि मगच ठरव तुला काय करायचे आहे ते.

.. मी शंकर जाधव आहे खरा पण मलाच माहीत नाही मी कोण आहे ते. मी लहान असताना कोणीतरी मला अनाथाश्रमाच्या पायरीवर आणून सोडलं असं आश्रमाचे चालक म्हणतात. मी तेव्हा दोन वर्षांचा असेन. मी अनाथाश्रमात वाढलो. चालकांनी मला शंकर जाधव असं नाव दिलं. हेही माझं खरं नाव नाहीच ना?

कोण जाणे मी कोण आहे.. कोणाचा आहे? मी धडपड करत शिकलो. आश्रमातून दहावीनंतर फक्त रहाण्यापुरता आसरा मिळाला मला. रात्रंदिवस अपार कष्ट केले, लहान मोठ्या नोकऱ्या केल्या. देवाने बाकी काही नाही तरी तीव्र बुद्धी मात्र दिली होती. त्या जोरावर सगळीकडे यश मिळवत इंजिनिअर झालो.

कसा ते विचारू नकोस. शिकवण्या घेऊन, कुठे मेसचे हिशेब लिहून फी जमवली. मग माझ्या मेरिटवर या कंपनीत ही चांगली नोकरी मिळवली. उत्तम पगार आहे मला. आणि माझ्या गरजाच अत्यंत कमी असल्याने मी फ्लॅट बुक करू शकलो. मिळेल तो येत्या वर्षात….. आशा, तुला निदान आईवडिलांनी नाव तरी दिलं. मग ते नकुशा का असेना. मला नाव देणारी आईच सोडून गेली….. बघ विचार कर. मला तू नाही म्हणालीस तरी वाईट नाही वाटणार. तुला आला तसे अनुभव मलाही आलेच आहेत. मला नकाराचं फारसं काही वाटत नाही हल्ली. तू थोडा वेळ घे.. पण लवकर सांग तुझं उत्तर. हल्ली जीव टांगणीला लागला की त्रास होतो. ” 

शंकर बोलायचा थांबला. त्याच्या काळ्याभोर डोळ्यात अश्रू तरळत होते.

आशा उठली. त्याचा हात हातात घेऊन म्हणाली, ” माझं भाग्य म्हणून असा प्रामाणिक हुशार जोडीदार मला मिळतोय. मला तुझ्या जातीशी.. अनाथपणाशी काहीही कर्तव्य नाही शंकर. माणूस म्हणून तू फार खरा आहेस रे. , दुर्मिळ असतात अशी माणसं. बाई मला म्हणाल्याच होत्या. तुला तुझा जोडीदार एक दिवस नक्की मिळेल… शंकर, करूया आपण लग्न. दोन दुःखी जीव एकत्र आले की सुख नक्कीच पायघड्या घालत येईल आपल्याकडे. ” 

– तितक्यात सुलभा परत आली.. आशाने न राहावून एकदम तिला मिठीच मारली…

… ” बाई आजपर्यंत माझं सगळं सगळं भलं तुम्हीच केलंत. “.. आणि आशा खाली वाकली.. आणि स्वतःच्याही नकळत शंकरही. दोघांनी सुलभाला जोडीने नमस्कार केला.

… दोघांना जवळ घेताना सुलभाच्या डोळ्यातून आनंदाश्रू मुक्तपणे वहात होते

– समाप्त –

© डॉ. ज्योती गोडबोले

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ नकुशा — भाग – १ ☆ डॉ. ज्योती गोडबोले ☆

डॉ. ज्योती गोडबोले 

? जीवनरंग ❤️

☆ नकुशा — भाग – १ ☆ डॉ. ज्योती गोडबोले 

नेरकर बाईंची बदली झाली तो भाग अगदी दुर्गम खेड्यातला होता.

एक डोंगर चढून दुसरा उतरला की जी वस्ती लागायची तिथे आदिवासी पाड्यातली ही शाळा.

सरकारी नोकरीमुळे त्यांना ही बदली घ्यावीच लागली. तरी एकाच ठिकाणी त्या दहा वर्षे होत्याच.

त्यांना एक तर राजीनामा देणे किंवा बदली स्वीकारणे हे दोनच पर्याय होते. घरची बेताची परिस्थिति, नणंदा सासू दीर एकच मुलगी ही जबाबदारी. नवऱ्याचा बेताचा पगार आणि या एवढ्या जबाबदाऱ्या म्हटल्यावर त्यांना नोकरी करणं प्राप्तच होतं.

नवीन गावात त्या रुजू झाल्या आणि तिथलं सगळं बघून घाबरूनच गेल्या. नवीन बाई आल्या हे समजल्याबरोबर गावातली मंडळी त्यांना भेटायला आली… 

“बाई, काळजी नका करू. आमचं गाव चांगलं आहे. आता आहे आदिवासी वस्ती खरी पण लोक गरीब आहेत. तुम्हाला त्रास नाही होणार. आधीच्या मास्तरांच्या दोन खोल्या रिकाम्या झाल्या आहेत त्या दाखवतो. तिथे रहा तुम्ही ”… पाटील म्हणाले. आग्रहाने त्यांना घरी घेऊन गेले.

पाटलीण बाई म्हणाल्या, “रहा हो बाई इथं. मी हाये की. रोज या इथं जेवायला. ” त्या हसून म्हणाल्या. ” इथं लै माणसं खात्यात पित्यात. त्यात तुम्ही जड न्हाय मला. लेकीवाणी माझ्या तुम्ही. ”

.. बाईंचे निम्मे ओझे त्या हसऱ्या गोड पाटलीण बाईना बघून दूर झाले.

– – अशा रीतीने सुलभा नेरकर लिंब गावच्या आदिवासीवाडीत शिक्षिका म्हणून रुजू झाल्या. दर शनिवारी रविवारी त्या आपल्या घरी नाशिकला पळत. तिकडे त्यांचा संसार मुलं नवरा वाट बघत असत.

सुलभाला पहिल्यांदा इथे रहाणे अतिशय जड गेले. कसली ती शाळा आणि कसली ती मुलं. बाईंकडे पहिली ते सातवी सगळे वर्ग होते. अजून एक शिक्षिका येणार होती ती अजून तरी रुजू झाली नव्हती.

वर्गात मुलांची उपस्थिती नगण्य असायची. आली तर आली नाहीतर घरून त्यांना पकडून आणावे लागायचे असं मुलं म्हणायची.

बाईंनी एक महिना सगळा आढावा घेतला. मुलाना न ओरडता, गोड बोलून, गोष्टी सांगायला सुरुवात केली.

नवीन बाई मारत नाहीत, गाणी गोष्टी शिकवतात म्हटल्यावर हळूहळू सगळी मुलं शाळेत यायला लागली.

त्या दिवशी हजेरी घेताना नाव समोर आलं.. ‘नकुशा मोरे’.

बाईंनी नाव घेतल्यावर एक काळी सावळी किडकिडीत मुलगी उभी राहिली. फाटके कपडे, केस किती दिवसात तेलाचा थेंबही न बघितलेले. डोळे मात्र चमकदार.

“बाय मीच नकुशा. ”

सुलभा म्हणाली, “ हे कसलं ग नाव तुझं? ”

तर हसत म्हणाली, ” बाई मी माझ्या आयेची पाचवी पोरगी. सगळ्याना नकोच होती. माझं नाव कुनी ठेवलंच न्हाय. आज्जी म्हणायची नकुशी पोरगी आली जलमाला. म्हनून सगळे मला नकुशा म्हणतात. ” 

… सुलभाच्या पोटात कालवलं. पाचवी मुलगी झाली म्हणून नकोशी? आणि तिचं नाव नकुशा?

हजेरी झाली आणि सुलभा शिकवण्यात गढून गेली. तिच रोज नकुशाकडे नीट लक्ष असायचं.

नकुशा रोज नेमाने शाळेत यायची. नाही पुस्तक नाही पाटी.

एक दिवस भावाची फाटकी चड्डी आणि सदरा घालून आली. ” नकुशा, हे कसले कपडे? असं घालून शाळेत यायचं नाही. मला चालणार नाही. ”

नकुशा मान खाली घालून उभी राहिली. ” बाई, एकच झगा आहे मला. तो काल धुतला तर अजून वल्ला हाये. मग हे कुडतं घातलं. शाळा बुडली तर तुम्ही रागाला येता न्हवं? मलाबी शाळा आणि तुम्ही लै आवडता. , म्हनून येते मी. घरी लै काम सांगती माय. इथं मला अब्यास आवडतो कराया. ”

सुलभाला अतिशय वाईट वाटलं. त्या आठवड्यात ती घरी गेली तेव्हा आपल्या मुलीचे, स्वप्नाचे कपडे तिने नकुशासाठी बॅगेत भरले. स्वप्नापेक्षा लहान होती नकुशा. पण होतील तिला. म्हणत सुलभाने तिला तेल कंगवा रिबिनी पण घेतल्या.

बाकीच्या मुलींची परिस्थिती तरी कुठे धड होती? पण नकुशा इतकी वाईट नव्हती. नकुशा खरोखरच नकोशी होती आईबापांना. पाच बहिणी आणि मग झालेला भाऊ. तो जीव की प्राण. नकुशा पाठोपाठच वर्षातच झालेला.

नकुशाला सुलभाने घरी बोलावले. नकुशा घाबरत घाबरत घरी आली.

“नकुशा, हे बघ मी काय आणलं तुला? या परीक्षेत तुला छान मार्क मिळाले ना म्हणून तुला बक्षिस. ”

नकुशाच्या डोळ्यात पाणी आलं. नकुशाने विचारलं, “ हे सगळं मला? एकलीला? बया. लै झ्याक आहेत बाई.. “

“ आता नकुशा, असाच छान अभ्यास करायचा. ”

“ बाई, मी इथं येऊ रातची झोपायला? मला अब्यास करायला जागा न्हाय झोपडीत. बा लै दारू पेतो. आयेला आमाला लै मारतो. मी येऊ का? मी तरास न्हाय देनार तुमाला. ” 

 

 

सुलभाला गहिवरून आलं. “ ये तू नकुशा. पण तुझ्या आईची परवानगी घ्यायला मी उद्या घरी येईन तुझ्या. ”

दुसऱ्या दिवशी शाळा सुटल्यावर सुलभा नकुशाबरोबर तिच्या घरी गेली. घर कसलं, नुसती झोपडी होती ती. आत वाकून शिरावं लागत होतं. दारिद्र्य म्हणजे काय हे मूर्तिमंत उभं होतं तिथे.

“आये माज्या बाई आल्यात ग. ”.. आई लगबगीने बाहेर आली.

सुलभा म्हणाली, “ तुमची मुलगी फार गुणी आणि हुशार आहे हो. तिला अभ्यासाला जागा नाहीये.

माझ्याकडे झोपायला आली तर चालेल का? मी तिचा अभ्यासही घेत जाईन. ”

आई म्हणाली ” न्या खुशाल. बाकीच्या या पोरट्या नको म्हणत्यात शाळा. बसल्यात घरी नुसत्या उंडग्या. ही नकुशी लै गुणगान करती तुमचं. येक तरी माजी पोर शिकू दे. काय करावं बाय… नवरा काही कमवत नाही. मीच करती कष्ट. काय सांगू तुमाला. न्या हिला तुमी. ” 

“अहो हिचं नाव मी सरकारी गॅझेटमध्ये बदलून घेऊ का? हे कसलं हो नाव? आपलं लेकरू कोणाला नकोसं होतं का हो? ” सुलभाने खूप विचारांती हे ठरवलं होतं.

“ अहो पाचवी पोरगी कोनाला हवी असनारे? काय ग नकुशे? नाव बदलतीस व्हय? अन काय ठेवती नवं नाव तुझी ही बाई? ” – ती आई गोंधळून गेली होती.

नकुशा लाजली. म्हणाली, “ मला आशा नाव आवडतं. बाई, नकुशी असलेली पोरगी आशा करून टाका तुम्ही. ”

सुलभा मनापासून हसली.. “ आता हिला नकुशा नाही म्हणायचं कोणी. आपण तुझं नाव आशा असं बदलून घेऊ. ”

… दुसऱ्या दिवशी सुलभाने शाळेत सगळ्याना सांगितलं, “ हिला आता नकुशा नाही म्हणायचं. तिचं नाव मी सरकारी गॅझेट मध्ये बदलून घेतलंय. आता ती आपली आशा झालीय हं. ”

आशा रोज बाईंच्या घरी रहायची. सुलभा कसा स्वयंपाक करते ते नीट बघायची. “अग आशा, आता थोडं वेळ घरी जा तुझ्या. ” तर म्हणायची “ नको. इथंच मस्त वाटतं मला बाई. ”

सुलभाच्या घरी राहून आशाची भाषा एकदम सुधारली. आशा झपाट्याने मोठी झाली. तरतरीत आशा आता छान दिसायला लागली. अजूनही सुलभाची बदली काही मूळ गावी होत नव्हती. आशा छान मार्क्स मिळवून दहावी झाली. अचानक सुलभाची बदली नाशिकला झाली.

“ आशा, तुझ्या या खेड्यात दहावी नंतर कॉलेज नाही. तू माझ्याबरोबर नाशिकला येतेस का?

तुझी आपण वसतिगृहात सोय करूया तिथे राहून घेशील का पुढचं शिक्षण? तुम्हाला जातीचे खूप फायदे मिळतात. घे करुन फायदा. शीक चांगली पुढे. मी आहेच ना तुझ्यासाठी. ” सुलभा अगदी मनापासून बोलत होती.

“ हो बाई. आवडेलच मला. मला तुमच्या लोकांसारखं शिकून मोठं व्हायचंय. मी राहीन वसतिगृहात. तुमच्या घरी राहून मी खरं जेवण कसं असतं ते बघितलं बाई. आमच्या घरी भाकरी असली तर भात नाही. भाकरीवर तिखट घालून खायचं. भाकरी वाळवून ठेवायच्या आणि मग पाण्यात कालवून खायच्या. पण वसतिगृहात यापेक्षा नक्की चांगलं असेल जेवण ना? मी राहीन तिथे. ”

आशाला नाशिकला आदिवासी वसतिगृहात सहज प्रवेश मिळाला. आशा तिथे राहून कॉलेजला जाऊ लागली. तिला हे शहर अतिशय आवडलं. आशाला सुलभा स्वप्नाचे ड्रेस देई. आशा ते आपल्या मापाचे करून मस्त वापरत असे. जन्मजात या लोकांना सगळ्यांशी आणि परिस्थितीशी जुळवून घ्यायची असलेली सवय तिला इथे उपयोगीच पडली. आशा बघता बघता बीकॉम झाली. तेही छान मार्क्स मिळवून.

 – क्रमशः भाग पहिला 

© डॉ. ज्योती गोडबोले

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ रंग… ☆ डॉ. शैलजा करोडे ☆

डॉ. शैलजा करोडे

🌸 जीवनरंग 🌸

☆ रंग… ☆ डॉ. शैलजा करोडे

“होळी दहनावर भद्राचे सावट. भद्रा काळात होळी पेटविण्यासाठी भद्राचा पुच्छ काळ रात्री 12. 50 ते 1. 55 पर्यंत. या कालावधीत होळी पेटवावी. आमच्या सोसायटीच्या समूहावर हा मेसेज झळकला. तसेच दुसर्‍या दिवशी चंद्रग्रहण असल्याने होळी आज रात्रीच पेटवली जाईल. तरी सगळ्यांनी हजर राहून या आनंदोत्सवात सहभागी व्हावे. “

मी whats app बंद केला. आपली सगळी आन्हिकं आटोपून, तयारी करुन मी हास्पिटलला जाण्यास निघाले. सणवार असो कि शुभकार्य माझ्या पेशात याला जागाच नव्हती. रूग्णसेवा यालाच प्राथमिकता होती आणि आजाराला सणावाराशी काय घेणं देणं.

” आई, जाऊन येते गं ” ” निघालीस बाळ, सायंकाळी जरा लवकर येशील, आज होळी आहेना. पुरणाची पोळी, खीर, कटाची आमटी करणार आहे मी. तुझी ड्यूटी संपली कि मला फोन कर. म्हणजे मी पुरणपोळ्या करायला घेईन, तुला गरमगरम खायला वाढेल “. ” आई, कशाला एवढी धडपड करतेस. तू दुपारीच करुन ठेव पोळ्या, मी खाईन सायंकाळी “. ” अगं पुरणपोळी गरमच चांगली लागते. त्यावर तूपाची धार गरम असतांनाच बरी वाटते. तू निघण्यापूर्वी मला फोन कर. बस एवढंच कर. ” ” बरं बाई, निघण्यापूर्वी करीन तुला फोन, आता जाऊ मी “. ” अगं परत चूक. जाऊन येते म्हण “. ” होय, जाऊन येते मी “. हसत हसत आईचा निरोप घेऊन मी निघाले. पार्किंग शेडमधून गाडी काढली. तर चाकातील हवा कमी झालेली. बरं घराजवळच गॅरेज होतं, हवा भरली अन मी निघाले.

” नमस्कार डाॅक्टर, हॅलो डाॅक्टर ” अभिवादन स्विकारत मी माझ्या केबिनमध्ये शिरले. ” सिस्टर, काय पोझिशन? किती पेशंट आहेत? ” ” “डाॅक्टर पंधरा पेशंट आहेत ” “O K, पाठवा एक एक आत “.

” नमस्कार डाॅक्टर ” ” नमस्कार बसा ” एक बाई आपली दहा वर्षांची मुलगी घेऊन आली होती. बोला काय त्रास होतोय. डाॅक्टर माझी ही मुलगी दहा वर्षाचीच आहे. पण कालपासून हिची मासिक पाळी सुरु झालीय. खूप लवकर आहे ताई हे सगळं. मुलगी लहान आहे ताई माझी. बावरली आहे. पाळी अजून दोन वर्ष येणार नाही असं काही करता येईल काय? “

” नाही बाई, असं करू नका. तुमच्या मुलीची पाळी अकाली सुरू झाली ती आजकालची बदललेली जीवनपद्धतीमुळे. मुलांच्या हाती मोबाईल आहे. ज्या गोष्टी कुटुंबात बोलल्या जात नाहीत मुले त्या गोष्टी इंटरनेटवर शोधतात. लैंगिक भावना चाळवल्या जातात. आजची बदललेली खानपान व्यवस्था. चीज, पिझ्झा, बर्गर व इतर फास्ट फूड वजनवाढीस कारणीभूत ठरतात. आनुवांशिकता ही असू शकते. मनावरील ताणतणाव, प्लास्टीक आणि पेस्टीसाईडमधील रसायने, थंड व साखरयुक्त पेय असे अनेक घटक असतात यामागे. शरीरातील चरबीचे प्रमाण वाढले कि इंस्ट्रोजन संप्रेरक लवकर सक्रिय होते ज्यामुळे पाळी लवकर येते

तुम्ही आता असं करा. मुलीला पौष्टिक आहार (फळे व भाज्या) द्या. शारीरिक हालचाल, व्यायाम वाढवा. मानसिक ताण टाळण्यासाठी योग्य वातावरण ठेवा

मुलीला मैदानी खेळासाठी. प्रोत्साहन द्या.

यामुळे मुलीची समस्या बर्‍याच अंशी कमी होईल. मी काही औषधे देते. सगळं ठीक होईल. या तुम्ही आता.

Next मी बेल दाबत म्हटले. एक सत्तर वर्षाच्या आजीबाई आत आल्या. ” काय त्रास होतो आजी तुम्हांला ” ” पांढरी धुपणी अचानकच सुरु झालीय ” मी चेकअप केले. “आजी सोनोग्राफी करायला लागेल “.

एक पहिलटकरीण लेबरमध्ये होती. मधून मधून तिकडेही जावे लागत होते.

सगळं काम संपेपर्यंत रात्रीचे आठ वाजलेच होते. चला निघूया घरी, तत्पूर्वी आईला फोन करावा लागेल, नाहीतर नाराज होईल बिचारी.

घरात पाऊल ठेवलं तशी पुरणपोळीचा घमघमाट सर्वत्र भरलेला. ” वन्स, तुम्ही फ्रेश व्हा तोपर्यंत मी पानं घेतं सगळ्यांसाठी. ” काय गं सुनेत्रा हाॅस्पिटलचा सगळा पेशंटचा ताण तुझ्यावरच का? काही कामे तुझ्या सबआँर्डीनेटवरही सोपवत जा. अतिरिक्त स्टाफचीही मागणी कर “. ” होय दादा, मी सांगितलंय हाॅस्पिटला प्रशासनाला. शिवाय पेशंटचा माझ्यावरच विश्वास असल्याने मलाही नाही म्हणता येत नाही. ” माझा दादा सुशांत बोलत होता.

खेळीमेळीत जेवणे आटोपली. थोडी शतपावली करावी म्हणून मी खाली उतरले. सोसायटीच्या प्रांगणात दहनासाठी होळीची सगळी तयारी झाली होती. रांगोळी, पताका, विविध रंग आणि प्रसादाचीही सिद्धता होती.

” सुनेत्राताई, आज होलीका दहन तुमच्याच शुभहस्ते करायचंय बरं का. बरोबर रात्री 12. 50 ला पेटवूया होळी.

होळी दहनात कसे सर्व चिंता, द्वेष, मत्सर दूर सारून विविध रंगाच्या रंगात रंगणे आणि मनातील कटुता विसरुन पुन्हा नवऊर्जेने, गोडव्याने, बधुभाव जपत जीवनक्रमणा करणे किती गहन संदेश आहे यामागे. मी होलीका दहनाला चूड लावली. मनोभावे नमस्कार केला.

आज धुळवडची सगळीकडे सुट्टी. मी पण जरा निवांत होते कि हाॅस्पिटलच्या इमर्जन्सी मधून फोन आला. ” डाॅक्टर तुम्ही लवकर या ” नर्स शर्वरी बोलत होती. ” काय झालंय शर्वरी “. “डाँक्टर एक सतरा / अठरा वर्षाची पहिलटकरीण मुलगी आहे. तिचं बी पी शूट झालंय. ग्लानीतच आहे. बहुतेक सिझरच करावं लागेल ” ” ठीक आहे, येते मी, तुम्ही आँपरेशन थिएटर सुसज्ज ठेवा. “

” पेशंटसोबत कोण आहे. एक पन्नाशीच्या असपासची बाई समोर आली. तिच्यासोबत दोन/तीन माणसंही होती तुम्ही पेशंटची आई काय? ” नाही, मी आई नाही. ” बरं पेशंटच्या नवर्‍याला बोलवा, या फाॅर्मवर सही लागेल. ” ” नवरा नाही, आमच्या धंद्यात लेकराला फक्त माय असते. ” ” अरे बापरे, म्हणजे ही मुलगी रेड लाईट एरियातील होती. इतक्या लहान वयात अत्याचाराने ग्रस्त होती आणि त्यात हे लादलेलं मातृत्व. Horrible आहे सगळं ” ” मी करते सही म्हणत त्या बाईने आपला अंगठा फार्मवर उठवला.

पेशंटला अँनेस्थेशिया दिला, सलाईन, आँक्सिजन सुरू होतं. दीड तासाच्या अथक प्रयत्नातून सिझर व्यवस्थित होऊन बाळ व बाळंतीण दोघांनाही मी सुखरूप ठेवू शकले. शर्वरीने टाके घातले. पेशंट हळूहळू शुद्धीत येत होती. ” अं, पाणी, पाणी द्या मला. कुठे आहे मी, माझं बाळ कोठे आहे. ” ” हे बघ, शर्वरीने मऊसूत कपड्यात गुंडाळलेलं लालसर, बदामी रंगाचं ते नवजात बाळ तिच्यासमोर धरलं तशी ती मोठ्याने रडू लागली. ” अगं, मुलगा झाला आहे तुला. आनंद नाही झाला? का रडतेस? ” ” रडू नाहीतर काय करू डाॅक्टर. मी काय घडवू शकणार काय त्याला. या धद्यात पुढे तो दलालीच करेल. मुलगी असती तर पुन्हा ते नरकातलं जिणं ” ” नाही होणार आता असं. ” ” काय! खरंच तसं नाही होणार. डाॅक्टर माझ्या बाळाला चांगलं जीवन मिळेल? ” होय, मिळू शकतं? पण तुलाही हिंमत दाखवावी लागेल. पण मला सांग तू या धद्यात आली कशी? आली नाही मॅडम आणली गेली. तेही माझ्या बापानेच. एक नंबरचा दारूड्या. आई होती तोपर्यंत ती कष्ट करुन त्याच्या दारुला पुरे पडत होती. ती गेली, आणि याने दारूसाठी मला विकलं. ” इथे तुला खायला मिळेल. चांगले कपडे मिळतील, सांगत सोडून गेला मला इथे. पुन्हा आलाच नाही “

” बरं, मी उद्या पोलीस सबइन्सपेक्टरना इथे बोलावून घेईन. तुझ्या मनाविरूद्ध आता कोणीही तुला त्या नरकात ढकलणार नाही. शिवाय पोलीस संरक्षण राहिल. त्यांच्या मार्फतच तुला शासकिय वसतिगृहात प्रवेश मिळेल. तुझी व तुझ्या बाळाची योग्य काळजी घेतली जाईल. तुझी तब्येत बरी झाली कि तुला शिक्षण घ्यायचं असलं तर शिकू शकतेस. नंतर नोकरीसाठीही प्रयत्न केले जातील. ” ” मॅडम, खरंच असं होईल. तसं झालं तर जीवाचं रान करीन मी माझ्या बाळासाठी, त्याला शिकवीन, खूप मोठा करीन आणि एक जवाबदार नागरिक बनवीन “. ” होय, हे सगळं होईल. त्यामुळे आता रडायचं नाही. हस बघू. ” तशी जुई प्रसन्नपणे हसली, फुललेल्या जुईसारखी. ” आता पोटभर जेवयाच. बाळाला दूध हवं ना ” जुईने होकारार्थी मान हलविली.

आज धुळवडच्या दिवशी जुईच्या जीवनातील काळा रंग मिटवून सप्तरंग मी तिच्या आयुष्यात आणले होते.

© डॉ. शैलजा करोडे

नेरुळ नवी मुंबई मो. 9764808391

ईमेल – karodeshailaja@gmail.com 

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /मंजुषा मुळे/गौरी गाडेकर ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ “वेगळी सकाळ आणि नव्या मैत्रिणी…” – भाग – २ ☆ श्री सुधीर करंदीकर ☆

श्री सुधीर करंदीकर

🔆 जीवनरंग 🔆

☆ “वेगळी सकाळ आणि नव्या मैत्रिणी…” – भाग – २ ☆ श्री सुधीर करंदीकर

(अशी दुसऱ्यांनी दिलेली धडक मला आवडेल का? नक्कीच नाही. मग, मी दिलेली धडक इतर कुणाला आवडेल का? तर नाही.

‘इस हाथ दे – उस हाथ ले’. व्हेरी सिम्पल. म्हणून गाडी चालवतांना ‘नो मोबाईल’.) 

इथून पुढे — 

आम्ही रस्त्यावर नजर टाकली, तर, खरोखरच हेल्मेट, सीटबेल्ट वापरतांना सगळेच दिसत होते. आम्ही दोघींनी एकमेकीला चिमटा काढून शुद्धीवर असल्याची खात्री करून घेतली.

मेघना : इथे चौकात कुठेच ट्रॅफिक पोलीस दिसत नाहीत. स्पीड लिमिट न पाळणे, झेब्रा क्रॉसिंग वर गाडी उभी करणे, नो एंट्रीतून येणे, वगैरे कोण बघतं? , कोण पकडतो?

परदेशी माणूस : इथे सगळेच लोक सुशिक्षित आहेत, सगळ्यांना वाचता येतं. रस्त्यावर स्पीड लिमिटचे बोर्ड कां लावले आहेत? रस्त्यावर लेन कां मार्क केल्या आहेत? झेब्रा क्रॉसिंग कां मार्क केले आहेत? याचा अर्थ सगळ्यांना समजतो. इथे फक्त वाहतूक आणि सुरक्षितता यांच्याशी संबंध असलेलेच बोर्ड रस्त्यावर लावता येतात.

मेघना : अहो आमच्या कडे पण सगळ्यांना वाचता येतं, आमच्याकडे पण रस्त्यावर असे बोर्ड असतात. पण जास्त बोर्ड चा भरणा वाढदिवसांचे बोर्ड आणि जाहिराती यांचा असतो. त्यामुळे सुरक्षितता संबंधी बोर्ड कुणालाच दिसत नाहीत, आणि कुणी बघितले – तरी ते पाळत नाहीत. याला आम्ही, ‘कळतं पण वळत नाही’ असं म्हणतो.

मनवानी मेघनाला हळूच चिमटा काढला, अगं, मराठी माणसांनाच ही सवय आहे, म्हणूनच ही म्हण फक्त मराठीत आहे. इंग्रजीत तू ‘अंडरस्टॅण्डिंग बट नॉट टर्निंग’ अशी म्हण कधी ऐकली आहेस का?

मनवा : अहो, इथे स्पीड ब्रेकर दिसत नाहीत, जिथे फोर व्हीलर ला एंट्री नाही, तिथे खांब दिसत नाहीत, फुटपाथवर टू व्हीलर नेऊ नये म्हणून तिथे खांब नाहीत.

फुटपाथवर खांब हा काय प्रकार आहे, हे परदेशी माणसाला बम्पर गेले असावे, त्यामुळे तो, ‘वॉट, वॉट, वॉट इज दॅट’ असं विचारायला लागला. आमच्या लक्षात आलं, की, जे बोर्ड वाचून तसं वागत नाहीत, त्यांच्याकरताच स्पीड ब्रेकर आणि खांब लागतात. आणि यांचा शोध आपल्या कडेच लागला असणार.

हे सगळं ऐकल्यावर सगळ्यांच्याच मनात एक शंका नक्कीच येणार, तीच मनवाच्या पण मनात आली. विचारू का नको, असं करत, तिनी विचारलंच —

मनवा : इथे सगळे लोक नियम पाळतात, त्यामुळे कुणालाच अडवायचे नाही, कुणाचं लायसन्स बघायचं नाही, कुणाच्या पावत्या फाडायच्या नाहीत, मग इथे ट्रॅफिक पोलीस असतात का नाही? आणि असले, तर ते करतात काय?

परदेशी माणूस : अहो, इथे पोलीस आहेत. ते सगळ्या ट्रॅफिक वर नजर ठेवून असतात. कुठल्याही कारणामुळे कुठेही काहीही अडचण असेल, तर ते लगेच मदतीला पोहोचतात. सगळे रस्ते, फुटपाथ यांची स्वच्छता, वेळच्या वेळी दुरुस्ती, रस्त्यावरचे मार्किंग – पट्टे, या सगळ्या गोष्टी तेच पाहत असतात. इथे तुम्हाला रस्त्यावर एकही खड्डा दिसणार नाही, कचरा दिसणार नाही, एकही सिग्नल बंद दिसणार नाही.

मेघना : तुमचं हे सगळं ऐकून आणि बघून, असं वाटतं, की, आम्ही एखाद्या काल्पनिक दुनियेत आहोत. अजूनही काही विचारलं तर चालेल का?

परदेशी माणूस : हो, पण छोट्याश्या ब्रेक नंतर —

परदेशी माणसानी बाजूच्या व्हेंडिंग मशीन मधून ३ कोक आणले, आणि म्हणाला, चियर्स. एक एक घोट घ्या आणि विचारा.

मेघना : आमच्या कडे लोक रस्त्यावर कचरा जाळतात, खूप धूर सोडणारे आणि कर्कश्य आवाज करणारे फटाके फोडतात. सण साजरे करण्याकरता, मोठमोठया मिरवणूक काढतात, ट्रॅफिक जॅम होतो. कर्कश्य आवाजात गाणी लावलेली असतात. ही यादी खूप मोठी होईल. तुमच्या कडे असे प्रकार असतात का?

परदेशी माणूस : तुम्ही सांगता एवढी वाईट परिस्थिती इथे कधीच नव्हती. पण थोड्याफार प्रमाणात काही गोष्टी असायच्या. आता यातले काहीच इथे बघायला मिळणार नाही. इथल्या सामाजिक संस्था, लोकांच्या सभा घेऊन, वर्तमानपत्रांमधून, व इतर उपक्रमांमधून, हे केल्यामुळे होणारे दुष्परिणाम, लोकांना वेळोवेळी समजावून सांगतात. राजकीय विरोधी पक्ष पण, आपले नाव विरोधी, म्हणून सरकारच्या सगळ्याच धोरणांना विरोध करत नाहीत. चांगले असेल त्याला सगळेच मनापासून पाठिंबा देतात. इथे लोकांना एकदा कळलं, की, लगेच ते वळतं. ज्यामुळे सामाजिक स्वास्थ्य बिघडेल किंवा ज्यामुळे देशाच्या संपत्तीला हानी पोहोचेल, अशा गोष्टी इथे कुणीच करणार नाही. सगळेच राजकीय पक्ष याबाबतीत एकत्र काम करतात. विरोधी पक्ष म्हणून कायम विरोधीच भूमिका घ्यायची, हा प्रकार इथे नाही. लोकांचे हित, हेच सगळ्या पक्षांचे उद्दिष्ट असते.

मनवा : वा, तुमच्याकडून आज खूपच शिकायला मिळालं. आमच्याकडे असा बदल झाला तर काय मजा येईल!

(अशा ठिकाणी आता ३ महिने राहायला मिळणार, या कल्पनेनीच आम्ही सुखावलो). आम्ही परदेशी माणसाचे नाव विचारले, त्यांचे आभार मानले आणि त्यांना बाय – बाय केले – – – 

मी : वा, म्हणजे तुम्ही ३ महिने प्रदूषण मुक्त हवा आणि पाणी यांचा आस्वाद घेतला. तिथले अन्नपदार्थ पण केमिकल विरहित आणि भेसळ विरहित असणार! मस्तच! आपल्याकडे फक्त नारळ हाच एकमेव असेल, की, ज्यात केमिकल नाहीत आणि भेसळ नाही.

मनवा आणि मेघना : काका, तिकडे अन्न आणि औषधे यात भेसळ करणाऱ्याला नक्कीच फाशी असणार. काका, तुम्ही आता ड्राय – डे कधी सुरु करताय?

मी : मॅडम, तुम्ही स्वीडन ला जाऊन आला, आणि तुमचा स्टॉप शंकराच्या मंदिराजवळ आहे, म्हणून तुम्ही सोमवारी ड्राय – डे सुरु केला. मॅडम, मी दोनदा स्वीडनला जाऊन आलो, आणि माझ्या रोजच्या फिरण्याच्या रस्त्यावर शंकर, देवी, दत्त, बालाजी, मारुती, नवग्रह, अशी सगळीच देवळे आहेत, म्हणून मी रोजच ड्राय – डे पाळतो. फिरायला जातांना नो मोबाईल, गाडी चालवतांना नो मोबाईल, लिफ्ट मध्ये – जिने चढ/ उतरतांना नो मोबाईल, कुणाशी बोलतांना – गप्पा मारतांना नो मोबाईल, जेवतांना नो मोबाईल.

मनवा : काका, ग्रेट. तुम्ही आमच्याही पुढे आहात.

मी : आज तुमचा स्वीडन चा अनुभव ऐकायला मिळाला, खूप मजा आली. तुम्ही सांगितलेल्या सगळ्या गोष्टी, जर आपण सगळ्यांनीच आचरणात आणल्या, म्हणजे कळत्याला वळते केले, तर सगळ्यांचच जगणं खूप खूप सुखकर होई, यात शंकाच नाही. अर्थात हे कुत्र्याची शेपूट सरळ करण्यासारखे आहे.

मेघना : आपण सगळ्यांनीच जर नेपोलियन वर विश्वास ठेवला, तर अशक्य असं काहीच नाही, काका. शेपूट पण सरळ होईल.

आम्ही आता निघतो. लेट अस् ऑल बी पॉझिटीव्ह अँड होप फॉर द बेस्ट.

मी : यस मॅडम. नक्कीच. माहिती आणि चहा बद्दल धन्यवाद. पुन्हा भेटू. मी माझे नाव त्यांना सांगितले आणि त्यांची नावे विचारली.

त्या दोघी एकदम : एम फॉर मनवा आणि एम फॉर मेघना.

समाप्त –

© श्री सुधीर करंदीकर

मो. 9225631100 – ईमेल – srkarandikar@gmail. com

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ “वेगळी सकाळ आणि नव्या मैत्रिणी…” – भाग – १ ☆ श्री सुधीर करंदीकर ☆

श्री सुधीर करंदीकर

🔆 जीवनरंग 🔆

☆ “वेगळी सकाळ आणि नव्या मैत्रिणी…” – भाग – १ ☆ श्री सुधीर करंदीकर

रोज सकाळी ४० ते ४५ मिनिटे फिरणे यासारखा सुंदर आणि सोपा व्यायाम नाही. फिरतांना छोटीशी पथ्य पाळायची असतात, आणि, ती म्हणजे, फिरतांना हातात मोबाईल नाही आणि घरगुती गप्पा नाहीत. फिरतांना भेटणाऱ्यांना हाय – हॅलो करत चालत राहिलो, तर चेहेरा आनंदित राहतो, आणि मन पण प्रसन्न राहते.

आणि एखादी वेगळी सकाळ अशी पण घडते – – 

खरंतर सकाळ ही रोजचं वेगळी असते, पण, आजची सकाळ जरा हटके, म्हणजे वेगळ्यातली वेगळी होती – – 

आम्ही सकाळी साधारण ७ – ७. १५ ला बाहेर पडतो. ही वेळ ऑफिसची असल्यामुळे, रस्त्यावर निरनिराळ्या ठिकाणी कंपन्यांच्या बसचे पिक – अप पॉईंट्स आहेत. काही ठिकाणी कॅब चे पिक – अप पॉईंट्स आहेत. त्यामुळे फिरण्याच्या पूर्ण रस्त्यावर, या वेळेला, फुटपाथवर थोड्या थोड्या अंतरावर मुले – मुली – स्त्री – पुरुष ग्रुपनी गाडीची वाट बघत उभे असतात.

काही ठिकाणी २ -३ जण असतात, तर काही ठिकाणी ६ – ७ जण असतात. रोजचे द्रुश्य म्हणजे, प्रत्येकाच्या हातात मोबाईल असतो. एकतर ही मंडळी फोनवर बोलत असते किंवा चॅट करत असते. काहींच्या कानाला मशीन लावलेले असते. सकाळी सकाळी भेट होते आहे, तर एकमेकांना हाय – हॅलो करणे, एकमेकांची विचारपूस करणे, काही गप्पा मारणे, हा प्रकार कधीच बघायला मिळत नाही.

आज बायकोला सकाळी एका लग्नाला जायचे होते, म्हणून मी नेहेमीच्या वेळेलाच, पण एकटाच फिरायला बाहेर पडलो.

मृत्युंजय मंदिराच्या जवळच, एका स्टॉप जवळ, दोन मुली उभ्या होत्या आणि चक्क मोठमोठयांनी हसत गप्पा मारत होत्या. एकीच्याही हातात मोबाईल नव्हता. दोघींच्या हातात बाजूच्या चहाच्या स्टॉल वरून घेतलेल्या चहाचे ग्लास होते. मुलींनाच असे नाही, पण कुणालाही असे मनमोकळं हसतांना बघितलं, की प्रसन्न वाटतं, मस्त वाटतं.

रस्त्यानी जातांना, असं काही वेगळं दिसलं, की आपोआपच आपली पावलं तिथे थांबतात. माझं पण असंच झालं. या रस्त्यानी मी इतके दिवस फिरतो आहे, पण मोबाईल नसणारी आणि एकमेकांशी बोलणारी माणसं, मी पहिल्यांदाच बघत होतो. आणि ती पण विथ स्माइलींग फेस! काय कारण असेल? ही माझी जिज्ञासा जागी झाली.

कारण समजण्याकरता, त्यांनाच विचारणे, हा एकच पर्याय होता.

मी : मॅडम, एक विचारू का?

(त्यांची नावे समजेपर्यंत आपण त्यांना मेघना आणि मनवा म्हणूया)

मेघना : विचारा काका, काहीही विचारा, आम्ही आज एकदम खुश आहोत 

मी माझी शंका त्यांना विचारली 

मनवा : काका, तुम्हाला आश्चर्य वाटणं साहजिक आहे. आज आम्ही एकमेकींना मोबाईल शिवाय बघतो, तेव्हा आम्हाला पण आश्चर्य वाटतं.

मेघना : काका, आज ड्राय-डे आहे 

मी : महाराष्ट्रात ड्राय-डे कुठे पाळतात? आणि आता तर सकाळ आहे 

मेघना : आमच्या ड्राय-डे चा दारूशी काहीही संबंध नाही. ड्राय-डे ला दारू नसते, आमच्या ड्राय-डे ला मोबाईल नसतो. मृत्युंजय मंदिराजवळ आमचा स्टॉप आहे, श्री शंकराचा वार सोमवार, म्हणून सोमवारी आमचा ड्राय-डे असतो. आज मोबाईलची जागा, हातात नसून आमच्या पर्स मध्ये असते. आणि वापर फक्त आलेला फोन घेण्याकरता किंवा काही फोन करण्याकरता.

मी : वा! काय मस्त आयडिया आहे! तुम्हाला ही कल्पना आली कशी?

मनवा : काका, नुकतेच, आम्ही दोघी युरोपमध्ये स्वीडनला होतो, तीन महिने. तिथे आम्हाला खूप शिकायला मिळाले. ही कल्पना पण त्यातूनच मिळाली. आमच्या ड्राय-डे बद्दल विचारणारे तुम्ही पहिलेच आहात. तुम्हाला ऐकायचे असेल, तर, आमच्या बरोबर चहा घ्यावा लागेल. मी काही उत्तर द्यायच्या आत, तिनी बाजूच्या चहावाल्यांना खूण केली, आणि माझ्या हातात चहाचा ग्लास आला.

मी : मॅडम, तुमची बस किती वाजता आहे? नाहीतर बोलण्याच्या नादात – — 

मेघना : कॅब आलेली आहे. ही काय आमची कार उभी आहे. आमचं फ्लेक्सी टायमिंग असतं, उशिरा गेलो, तर तेवढं नंतर थांबायचं! नो प्रॉब्लेम.

आता, ड्राय-डे ची कल्पना कशी आली – – -? त्याचं असं झालं – – 

स्वीडनमध्ये टू व्हीलर किंवा फोर व्हीलर चालवणारा एकही जण, आम्हाला मोबाईलवर बोलतांना दिसला नाही. आम्हालाही तुमच्यासारखचं आश्चर्य वाटलं. दुसऱ्याच दिवशी, आम्ही तिथल्या एकाला गाठलं, जसं शंका विचारायला तुम्ही आम्हाला गाठलं. तिथे सगळ्यांनाच इंग्रजी येतं.

मी : मॅडम, थोडा फरक आहे. मी दोघींना गाठलं, आणि तुम्ही दोघींनी एकाला गाठलं. त्यांनी पण तुम्हाला चहा ऑफर केला होता का? बरं, गाठल्यावर पुढे काय झालं?

त्या दोघी मला भूतकाळात घेऊन गेल्या ——

मेघना : आम्ही त्यांना विचारलं, की, इथे कोणीच गाडी चालवतांना मोबाईल वर बोलतांना दिसत नाही. पोलीस पकडतात का? दंड जास्त असतो का? लायसन्स जप्त करतात का?

परदेशी माणूस : अहो, गाडी चालवतांना मोबाईल वापरणे, स्वतः करताच धोकादायक असते, हे आम्हाला समजतं नाही का? ते पोलीसानी कशाला सांगायला पाहिजे! उन्हाळ्यात आपण डोक्यावर टोपी घेतो, पावसाळ्यात छत्री घेतो. छत्री नाही घेतली, तर पोलिसांनी आपल्याला पकडायला पाहिजे कां? मॅडम, पाऊस पडतोय, तुम्ही छत्री नाही घेतली – भिजल्यामुळे तुम्हाला ताप येईल – सर्दी होईल. द्या १० युरो दंड.

मी टू व्हीलर चालवतांना हेल्मेट घातले नाही, आणि काही कारणामुळे, रस्त्यावर गाडी घसरून पडलो, तर माझं डोकं फुटल्याशिवाय राहणार नाही, हे मला नक्कीच समजतं. त्यामुळे माझ्या सुरक्षिततेकरता मी हेल्मेट घालतोच. याच्या करता नियम आणि पोलीस कशाला पाहिजेत? कार चालवतांना आम्ही सीट बेल्ट लावतोच, त्याचं कारण हेच. अर्थात ज्याला मानेचा त्रास असेल, वयस्कर माणसांना हेल्मेट मुळे त्रास होत असेल, तर ते हेल्मेट वापरत नाहीत. हेल्मेट हे व्ययक्तिक सुरक्षिततेकरताच आहे..

मनवा : अहो, पण कार चालवणारे मोबाईल वर का बोलत नाहीत? अपघात झाला तर त्यांना काहीच होणार नसते! चालणाऱ्याचे बारा वाजतात! मग, याकरता काही नियम आहे का? दंड आहे का?

परदेशी माणूस : मॅडम, नियम आला, की, बघायला यंत्रणा आली. दंड आला, की, गैरव्यवहार आला. आणि मॅडम, समजा, माझ्या कारनी, ‘अ ‘, ‘ब’, ‘क ‘, ‘ड’, लोकांना धडक दिली, तर, मला काहीच होणार नाही, हे बरोबर आहे. आता, इतर कुणी असेच ४ -५ लोकांना उडवले आणि त्या ‘अ ‘, ‘ब’, ‘क ‘, ‘ड’, मध्ये माझे आई – वडील असले तर? बायको असू शकते! मुले असू शकतात! मित्र असू शकतात! अशी दुसऱ्यांनी दिलेली धडक मला आवडेल का? नक्कीच नाही. मग, मी दिलेली धडक इतर कुणाला आवडेल का? तर नाही.

‘इस हाथ दे – उस हाथ ले’. व्हेरी सिम्पल. म्हणून गाडी चालवतांना ‘नो मोबाईल’.

– क्रमशः भाग पहिला 

© श्री सुधीर करंदीकर

मो. 9225631100 – ईमेल – srkarandikar@gmail. com

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ तीन अनुवादित कथा – (१) मुलाचं प्रेम  / (२) माकडाचं स्पष्टीकरण – हिन्दी कथाकार : सुश्री मीरा जैन (३) सन्माननीय वेडा – हिन्दी कथाकार : संतोष सुपेकर ☆ मराठी अनुवाद : सुश्री मंजुषा सुनीत मुळे ☆

सुश्री मंजुषा सुनीत मुळे

?जीवनरंग ?

☆ तीन अनुवादित कथा – (१) मुलाचं प्रेम  / (२) माकडाचं स्पष्टीकरण – हिन्दी कथाकार : सुश्री मीरा जैन (३) सन्माननीय वेडा – हिन्दी कथाकार : संतोष सुपेकर ☆ मराठी अनुवाद : सुश्री मंजुषा सुनीत मुळे 

(१)  मुलाचं प्रेम 

आज हॉस्पिटलमध्ये दाखल केलेली एक आई बहुतेक शेवटचे श्वास मोजत होती. आईची ती तशी अवस्था पाहून तिच्या मुलाला – नवलला अतिशय वाईट वाटत होतं …. आणि हतबल झाल्यासारखंही. केविलवाणेपणाने तो त्याच्या व्हाट्सअप.. फेसबुकवर असणाऱ्या मित्रांना सारखा मेसेज पाठवत होता ….

“ मित्रांनो माझी आई खूप जास्त आजारी आहे. तिला लवकर बरं वाटावं म्हणून मला तुमच्या सगळ्यांच्या शुभेच्छांची आणि प्रार्थनेची फार फार गरज आहे … “ 

बऱ्याच मित्रांनीही लगेचच आपलेपणाने शुभेच्छांचे मेसेजेस पाठवायला सुरुवात केली…. आणि नवल अशा प्रत्येक मेसेजबद्दल धन्यवाद देण्यात गर्क झाला. पण व्हाट्सअप वरच्या एका मित्राने मात्र तो मेसेज वाचल्यावाचल्या आपल्या भावना मेसेजमधूनच व्यक्त करून न थांबता, तडक हॉस्पिटल गाठलं. प्रत्यक्षच जाऊन भेटलं तर नवलला जरा दिलासा मिळेल आणि त्याच्या आईसाठी नक्कीच काहीतरी करता येईल या भावनेने…

तो गेला, नवलजवळ बसला… नवललाही बरं वाटलं… आणि मग त्या मित्राने आईची प्रकृती सुधारण्याचा एक अचूक आणि खात्रीशीर उपाय नवलच्या कानात सांगितला…. पण तो उपाय ऐकून नवलच्या चेहेऱ्यावर पसरलेली चिंता कमी होण्याऐवजी दुपटीने गडद झाली.

त्या मित्राने नवलच्या कानात फक्त एवढंच तर सांगितलं होतं की … “ नवल तू लगेच आत आईजवळ जा, आणि तिच्या कानात फक्त एवढंच सांग की … ‘ आई … तू लवकरात लवकर बरी हो ना … तुझ्यावाचून घर अगदी सुनं सुनं वाटतंय गं! ‘ “ ….

तो मित्र दुसरा तिसरा कोणी नव्हता …. तर वृद्धाश्रमाचा मॅनेजर होता…

मूळ हिंदी कथा : बेटेकी ममता  

लेखिका : सुश्री मीरा जैन, उज्जैन.

—– 

(२)  माकडाचं स्पष्टीकरण…

दिवसभर दाणा पाणी शोधत इकडे तिकडे वणवण करत ती चिमणी फिरत राहिली होती. सगळं लक्ष मात्र घरट्यातल्या पिल्लांकडे होतं. संध्याकाळ झाली तशी ती घरट्याकडे परत फिरली. पण आज येतांना तिला नक्कीच काहीतरी वेगळंच जाणवत होतं. गावातली सगळी कुत्री आणि इतर सगळे प्राणीही अतिशय दु:खी दिसत होते …

‘कुठलाच आवाज नाही …. उगीच ओरडणं नाही … भांडणं नाहीत. असं तर कधीच होत नाही … मग आज का असे गप्प झालेले दिसताहेत सगळे.. आणि खूप दु:खी असल्यासारखे? नेमकं काय झालं असेल … आणि तेही एकदम या सगळ्यांच्या बाबतीत? ‘ … आता तिलाच फार अस्वस्थ वाटायला लागलं होतं. घरट्याजवळ येऊन ती झाडावर जराशी विसावली, इतक्यात शेजारच्या फांदीवर तशाच चिंताग्रस्त चेहेऱ्याने बसलेलं चिंटू माकड तिला दिसलं. ती पटकन उडून त्याच्याजवळ जाऊन बसली आणि मनातला प्रश्न त्याला विचारला… 

त्यावर चिंटू म्हणाला.. “ काय सांगू चिऊताई तुला.. अगं आज या गावात कसलं तरी आन्दोलन चाललं होतं. त्यात सात लोकांचा मृत्यू झाला आहे. ” 

“अरे बाप रे.. फार वाईट झालं हे… पण त्यामुळे माणसं दु:खी दिसण्याऐवजी हे प्राणीच जास्त दु:खी झालेले दिसताहेत की. असं का?“

… चिमणीच्या या प्रश्नावर चिंटू माकडाने अगदी सविस्तर उत्तर दिलं…

“आता काय सांगू तुला? काय झालंय की त्या दंगलीत मेलेली माणसं वेगवेगळ्या जातींची आहेत.. एका जातीतली तीन माणसं दगावली आहेत, आणि इतर जातींची प्रत्येकी दोन माणसं दगावली आहेत… का ते माहिती नाही, पण प्रत्येक जातीतली माणसं फक्त आपापल्या जातीतल्या माणसांसाठी दु:खी झाली आहेत … शोक व्यक्त करताहेत. … पण ही सगळी कुत्री आणि इतर प्राणी आहेत ना.. त्यांना त्या सातही माणसांच्या मरणाचं मनापासून दु:ख होतंय… कारण काय माहितीये? .. कारण त्यांना त्या सातही जणांमध्ये ‘ फक्त मनुष्य ‘ दिसतो आहे ना … म्हणून ….

मूळ हिंदी कथा : बंदरका विश्लेषण 

कथालेखिका : सुश्री मीरा जैन, उज्जैन.

—– 

(३) सन्माननीय वेडा – – – 

‘‘काय हो काका… हल्ली सकाळीच असं बागेत आल्यावरच काय होतं तुम्हाला? इथे मॉर्निंग वॉक करत असलेल्या माणसांकडे असे रोजच त्यांचे फोन मागत असता.. ते का? तुमच्यासारख्या प्रतिष्ठित माणसाने असं वागणं योग्य आहे असं वाटतं का तुम्हाला? ”… 

.. बागेत अशोकरावांबरोबर चालत असलेल्या अनिलने त्यांना विचारलं… ‘‘आणि मला तर हेच समजत

नाहीये की इथे येतांना तुम्ही स्वत:चा फोन का घेऊन येत नाही? दुसऱ्या कुणाकडे तरी त्याचा फोन

का मागायचा? तुमच्या अशा वागण्यामुळे लोक तुम्हाला वेडा म्हणायला लागलेत, माहितीये का तुम्हाला? ”

‘‘अरे बापरे… असं झालंय का? ” अशोकराव खदखदून हसले. ‘‘म्हणजे मी असं का करतो हे तुमच्याही लक्षात आलं नाहीये का? अहो इथे फिरायला आलेल्या सगळ्या लोकांकडे मी त्यांचा फोन मागतो…खरंय.. पण कशासाठी मागत असेन? मला एखादा फोन करायचा असतो म्हणून? इथे येतांना मी माझा फोन बरोबर आणत नसेन असं वाटतं का तुम्हाला? तर तसं नाहीये… माझा फोन नेहेमी माझ्याबरोबरच असतो. हा बघा.. पण मी असा विचित्र वागतो त्याचा परिणाम लक्षात आला नाही का तुमच्या? मला घाबरून म्हणा… किंवा माझ्यावर चिडून म्हणा… पण रोज सकाळी इथे फिरायला येणारे लोक हल्ली एकतर इथे त्यांचा फोन घेऊन येतच नाहीत, नाहीतर माझ्या भीतीने फिरतांना आपला फोन खिशातच ठेवायला लागले आहेत… आणि मला हेच तर हवं होतं! ”

‘‘पण असं का व्हायला हवंय् तुम्हाला? ”

‘‘ कारण ऐकायचे आहे? मग ऐका… त्याचं कारण इतकंच की सकाळी सकाळी इथे व्यायाम करायला, किंवा तब्बेत सुधारण्यासाठी म्हणून येणाऱ्या लोकांनी फक्त त्यांच्या आरोग्यावर, शरीर स्वास्थ्यावर लक्ष केंद्रित करावं… मोबाईलवर नाही असं मला वाटतं. मोबाईलसाठी तर उरलेला सगळा दिवस आणि पूर्ण रात्र असते ना त्यांच्यासाठी! अहो इथे आल्यावर मला नेहेमी असंच चित्र दिसायचं की लोक चालता चालताही त्या फोनलाच चिकटलेले असायचे… फोनवर सतत कुणाशी तरी बोलत असायचे… अगदी व्हिडिओ-कॉलही करत असायचे… आणि त्या नादात चालत असतांना चक्क पडायचेही कितीदा तरी… नाहीतर कुणाला तरी धडकायचे… पाय एकीकडे आणि नजर एकीकडे असंच असायचं ना! ..

… पण आता बघा… सगळे कसे शिस्तीत फक्त आपल्या चालण्याकडे.. पर्यायाने स्वतःच्या शरीरस्वास्थ्याकडे लक्ष देत असतात… आणि त्यांच्या स्वत:च्या नकळत या वेड्याचा हेतू पूर्ण करतात. ”… इतकं बोलून अशोकराव पुन्हा तसेच खदखदून हसले… 

… आणि अनिल विशेष आदराने त्यांच्याकडे पहात राहिला…

मूळ हिन्दी कथा: सम्माननीय पागल 

कथाकार : श्री. संतोष सुपेकर, उज्जैन 

मराठी अनुवाद : मंजुषा सुनीत मुळे

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ भूतबंगला… ☆ श्री प्रदीप केळुस्कर ☆

श्री प्रदीप केळुस्कर

? जीवनरंग ?

☆ भूतबंगला… ☆ श्री प्रदीप केळूसकर

विनायकचे मंदाशी लग्न झाले आणि मंदा परबांची सुन म्हणून आमच्या गावात आली. खरं तर विनायक निलाशी लग्न करणार असा सर्वांचा अंदाज होता कारण कुठल्या कुठल्या जत्रेत दोघे फिरताना दिसत होती. नीला विनायकच्या दुकानात बऱ्याच वेळा दिसें आणि कारण नसताना त्याच्याशी हसत बोलत असे. त्यामुळे माझ्यासकट सर्वाना वाटतं होते, विनायक नंदाशी लग्न करेल पण अचानक एक दिवस बातमी आली, विनायकचे लग्न ठरले.. पण नंदाशी नाही तर तालुक्याच्या गावातील कुणा दुसरी बरोबर.

माझी पत्नी पण आश्चर्यचकित झाली. तिला ही बातमी समजली तेंव्हा ती मला म्हणाली…

‘काय चल्ला तुमच्या मित्राचा? एका मुलीक फिरवल्यानं आणि दुसऱ्या बरोबर पाट धरता?

‘आसता बाये एखाद्याचा नशीब.. तेंका होयो तितके बायलो गावातत..

मग मला कळले विनायक च्या आई बाबांना नीला पसंत नव्हती. त्याचे बाबा मला रस्त्यात भेटले तेंव्हा म्हणाले..

‘नीला म्हणजे चालू पोर ता.. कोणाचेय गाडीवर बसुन जाईत.. मी विन्याक सांगलंय.. त्या पोराक माझ्या घरात हाडू नको..

मी गप्प झालो. शेवटी विनायक चे मंदाशी लग्न झाले.

मंदा दिसायला यथातथाच होती पण गुणी होती. तिला घरातील कामे उत्तम येत. ती घरात आली आणि परबांचे घर आणि परिसर स्वच्छ दिसू लागला. तिला अनेक पदार्थ येत, त्यामुळे विनायकचे आई बाबा खूष होते शिवाय हे सर्व ती खालच्या मानेने करी. पण विनायकचे लग्न झाले तरी निलाचे कारण नसताना विनायकच्या दुकानात जाणे आणि चेष्ठामस्करी करणे कमी झाले नव्हते. एक दिवस माझी पत्नी मला म्हणाली..

‘तुमच्या मित्राच्या दुकानात गेल्लात हल्ली?

‘जातंय मधी मधी..

‘त्या नीलाचो मुक्काम अजून आसता म्हणे दुकानात?

‘मी पण बघितलंय.. पण आपण काय शकतो दुसऱ्याच्या खाजगी आयुष्यात?

‘पण आता घरात बाईल आसा मा? पूर्वीचे दिवस वेगळे.. आता सांभाळून वागा..

मी गप्प राहिलो.

गणपतीच्या दिवसात परबाकडे सत्यनारायण होता म्हणून माझी पत्नी त्यांच्याघरी मदतीला गेलेली. रात्री घरी आल्यावर मला म्हणाली..

‘मंदा गप्पगप्प होती.. त्यान्च्याकडे काम करणारी काशी म्हणत होती..

‘मंदाक अंदाज इलोवा.. कोणीतरी चिठी लिहून विनायक आणि नीलाची भानगड आसा, अशी बातमी दिलिया.. त्या दिवसापासून मंदा गप्पगप्प आसा. मंदान आपल्या आईवडिलांका बोलावून आणल्यानं.. तेनी जावयाक जाब विचारलो.. पण विन्यात काय बदल नाय. विन्याच्या आईबाबांनीपण विन्याची खरडपट्टी काढली, पण..

शेवटी मी विन्याचा मित्र म्हणून त्याश्याशी बोलायला गेलो.

‘विन्या.. पूर्वीचे दिवस वेगळे पण आता घरात मंदा आसा.. तेच्याशी लग्न करून तेका घरात आणलंस.. आता त्या निलाचो नाद सोड, त्या नीला पायी तुजो दुकानात लक्ष नाय आणि संसारात पण नाय. लहान गावात असले गोष्टी प्रत्येकाक कळतत आणि तसेच ते तूझ्या बायकोक पण कळले बहुतेक..

‘पण मी बाबांका सांगाललंय, माका मंदाशी लग्न करुचा नाय, तरीपण माझ्या गळ्यात घातल्यानी..

‘पण त्यात त्या मंदाचो काय दोष? तेच्या गळ्यात माळ घातलास मा? असो दोन दगडावर पाय ठेवून मोठया संकटाक आमंत्रण देतंस, या लक्षात ठेव.

दसऱ्याच्या सुमारास नीला गावातून नाहीशी झाली, तिचे आईवडील तिला शोधत होते, त्यानी त्त्यांचे सर्व नातेवाईक, ओळखीच्या लोकांकडे चौकशी केली.. पण तिचा पत्ता लागला नाही.. मग लोकात कुजबुज सुरु झाली.. विन्यान नीलाक म्हापश्यात ठेवल्यानं आणि शनिवारी रविवारी आपण तिकडे जाता. आता विन्याचे दुकानात पण लक्ष नव्हते, त्याच्या दुकानात अनेक वस्तू मिळतं नव्हत्या.. दुकानातील कपाटे खाली दिसू लागली.

पंधरा दिवसानंतर माझी बायको मला सांगू लागली.

‘मंदा दिवाळीक माहेरी गेला ता परत येऊकच नाय..

मला वाईट वाटतं होते, एका नीलापायी परबांच्या घरात दुःख आले होते.

विन्याचे आईबाबा साधी माणसे होती. त्याना विन्याचे वागणे आवडत नव्हते पण.. विन्यापुढे त्त्यांचे पण काही चालत नव्हते, त्यात विन्याचे दुकानावरील दुर्लक्ष त्याना त्रास देत होते.

दिवाळीनंतर मंदाच्या वडिलांनी तिला सासरच्या घरी पोहोचवले.

घरी आल्यापासून मंदा गप्पगप्पच होती. विन्याला मंदा घरात असली काय नसली काय फरक पडत नव्हता. दुपारी घरी जेवण मिळतं होते.

मग मला कळले मंदा नवऱ्याबरोबर भांडत होती, त्या निलाचा नाद सोडण्यास सांगत होती. आपल्या जीवाचे बरेवाईट करण्याची धमकी देत होती. पण विन्या कुणाला भीक घालत नव्हता. शनिवार रविवार निलाकडे पळत होता.

आणि एके दिवशी.. मी तालुक्याच्या गावात जायचे म्हणून सकाळी लवकर स्कुटरला किक मारत होतो.. एव्हड्यात परबांच्या घराकडून ओरड ऐकू आली.. मोठमोठ्याने रडणे ऐकू आले.. माझी बायको पटकन घरातून बाहेर आली आणि मी स्कुटर परबांच्या घराकडे जोरात घेतली. मी आणि पत्नी पटकन घरात शिरलो.. विन्याची आई मोठमोठ्याने ओरडत होती.. बाबा थरथरत उभे होते.. मंदाने बिष घेतलेले दिसत होते.. तोंडाला फेस आला होता.. माझी बायको पटकन पुढे झाली.. मी आणि तिने मंदाला उचलून बाहेर रिक्षात घेतले, रिक्षा सिव्हिल हॉस्पिटलच्या दिशेने धावू लागली.

हॉस्पिटलमध्ये पोचण्याआधी मंदाने मान टाकली होती. डॉक्टरनी तिच्या मृत्यूची खात्री केली.. मग शवव्हिचेदन.. पोलीस कम्प्लेंट.. विन्याला अटक.. केस सुरु झाली.

मंदाच्या आत्महत्येमुळे परबांच्या घरावर अवकळा आली. मंदाच्या वडिलांनी विनायक तिला त्रास देत असल्याने आणि त्याच्या बाहेरख्याली वागण्याने कंटाळून मंदाने विष घेतले असा जबाब दिला. विन्या चार महिने जेलमध्ये राहिला आणि मग जमिनावर सुटला. त्याच्या दुकानाचे बारा वाजलेच होते.

विन्याचे आईबाबा या घरात राहायला घाबरू लागले. तरुण सुनेने घरात जीव दिला होता. तिचा आत्मा या घरात घुटमळतो आहे असा त्यांचा समज झाला होता. विन्या आता नीलाकडे रहात होता. विन्याच्या आईला वाईट वाईट स्वप्ने पडू लागली, त्यात तिची सुन रडताना दिसू लागली. विन्याच्या बाबांना कुणीतरी रडताना ऐकू येऊ लागले.. त्या दोघांची झोप उडाली.

शेवटी दोघांनी ते घर सोडले आणि ते त्यान्च्या कुटुंबाच्या जुन्या घरी राहू लागले.

मग जिकडेतिकडे बातमी पसरली.. कुणाला केस सोडलेली मंदा दिसू लागली, कुणाकुणाला विहिरीवर कपडे धुणारी मंदा दिसू लागली.. त्या वाडीतील लोकांनी त्या विहिरीवर जाणे सोडले.

गेले कित्येक वर्षे हा बंगला बंद आहे. मध्यंतरी विन्याचे वडील वारले.. मग दोन वर्षांनी त्याची आई वारली. म्हापशाला रहात असलेली नंदा मग गावात आली, त्या बंगल्यात विन्यासह राहू लागली.. तिची मुलगी पाच वर्षांची होती.

नीला या बंगल्यात राहू लागली खरी पण तिची मुलगी सतत आजारी पडू लागली. तिचे शाळेत लक्ष लागेना.. निलाला पण वाटू लागले… मंदाचा आत्मा या घरात वावरतो आहे, तो कुणाला सुख देणारं नाही.. तिने विन्याला सांगून जागा बदलली.

आता लोकांची खात्रीच झाली.

या घरात मंदाचा अतृप्त आत्मा कुणाला टिकू देत नाही.. त्यामुळे लोक या घराला म्हणू लागले.. भुताचा बंगला..

भुताच्या बंगल्याच्या आजूबाजूला झाडी वाढली. गेट गंजून गेले. विहिरीवरील पाण्याला शेवल चिकटला. कुणी सुद्धा कुणी त्या बाजूला जाईना. त्या बंगल्याच्या समोर बस स्टॉप होता.. त्याचे पण नाव पडले.. ‘भुताच्या बंगला स्टॉप.

जागा विनायकच्या नावे होती. विनायक आता म्हातारा झाला होता, नीला पण म्हातारी. त्यांची लेक शहरात. विनायकला पैशाची निकट होती.. म्हणून तो ही जागा आणि बंगला विकायला निघाला. पण कोण जागा विकत घेईना. तो मला सांगायला लागला.. ‘या बंगल्यासाठी गिऱ्हाईक बघ. मी त्याला म्हंटले.. ‘ही जागा भुताची म्हणून प्रसिद्ध झालिया.. आपल्या भागातलो कोण विकत घेऊचो नाय.. कोणी बाहेरचो आपटलो तर बघूया. पुढील दहा वर्षे तो बंगला तसाच होता.. हळूहळू जीर्ण होत चाललेला.

बाबुभाई पटेल यांची शहरात हार्डवेअर दुकानें होती. त्यांचे या भागावर लक्ष होते. त्यान्च्या मेहुण्यासाठी किरण पटेल याच्यासाठी जागा हवी होती.. जमिनीच्या एका एजेंटने त्यांना ही जागा दाखवली. बाबुभाईना जागा आवडली. पण अनेकांनी त्याना हा “भूतबंगला.. असल्याचे सांगितले. इथे रात्रीची भुते येतात असे पण सांगितले. बाबुभाई हसले.. त्यान्च्या लक्षात आले, ही जागा कोण घेणार नाही, मालकाकडे पाडून मागायला हवे.

बाबुभाई विनायकला भेटले. विनायक खूष झाला कारण पहिल्यांदाच कुणी गिऱ्हाईक आले होते. विनायकने किंमत सांगितली त्याच्या निम्याने बाबुभाईनी जागा मागितली आणि पदरात पाडून घेतली. विनायक खूष कारण त्या जागेचे थोडे तरी पैसे मिळाले.

बाबुभाईनी जेसीपी मागविले आणि संपूर्ण बंगला पाडला आणि दणकत बिल्डिंग उभी केली. खाली दुकान, त्याच्या बाजूला गोडावून आणि वरती राहायला मोठा फ्लॅट.

बाबुभाईचा मेहुणा किरण पटेल याने हार्डवेअर दुकान सुरु केले. भरपूर माल ठेवला. परिसरातील सुतार, वेल्डर, बांधकाम कामगार सर्वाशी गोड बोलून धंदा बसवीला.

दुकानावरती घरी बायको, मुले राहायला आली. नातेवाईक येतजात राहिले. गाड्या आल्या, ट्रक्स आले.. पातेलांच्या धंद्याला बरकत आली.

पण गावातील जुने लोक अजून ‘पटेलाना मंदाचे भूत दिसते का? याचीच चौकशी करत राहिले.

© श्री प्रदीप केळुसकर

मोबा. ९४२२३८१२९९ / ९३०७५२११५२

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ आग – भाग ३ (भावानुवाद) – हिन्दी कथाकार : डॉ हंसा दीप ☆ डाॅ. मीना श्रीवास्तव ☆

डाॅ. मीना श्रीवास्तव

? जीवनरंग ?

☆ आग – भाग ३ (भावानुवाद) – हिन्दी कथाकार : डॉ हंसा दीप ☆ डाॅ. मीना श्रीवास्तव 

डॉ. हंसा दीप

(जणू काही मी एक पिता नसून एखादा गुन्हेगार होतो, जो त्याला हानी पोहोचवू शकत होता. मी कल्पनेतही कधी कोणताच गुन्हा केला नव्हता. असे शक्य तरी होते कां की प्रत्यक्ष माझ्या प्रिय मुलाला मी कोणत्याही प्रकारे दुखापत करू शकेन? ) 

इथून पुढे – – 

पती-पत्नीमधील परस्पर समजूतदारपणा, प्रत्येक क्षण एकत्र घालवण्याची त्यांची तळमळ आणि त्यांच्या प्रेमभरल्या संवादाचे रूपांतर कंटाळवाणेपणा, ताणतणाव आणि विवशतेत झाल्यावर एकत्र राहणे देखील एक कठोर शिक्षाच होती. लहानसहान मतभेद स्वाभिमानाशी भिडल्यावर मोठे स्फोट घडवून आणतील हे नक्की होते. आम्हा दोघांमध्ये खूप कांही अस्ताव्यस्त पसरले होते. ते प्रेमाचे शेकडो क्षण आमच्या नात्यातील उसवलेले धागे विणण्यास कधीच आले नाहीत. ते जरी आमच्यात तडजोड करायला पुढे सरसावले असते तरी त्यांचे कांहीच चालले नसते, कारण आमच्यातील दरी आणखी रुंद करणाऱ्या कटू क्षणांनी तिथे आपले साम्राज्य व्यापून टाकलेले होते.

ठीक आहे, माझ्या पत्नीशी माझे वैचारिक मतभेद होते, पण मी तिला कधीही क्रूरपणे वागवले नाही. या संबंधविच्छेदामुळे तिला झालेल्या आघातापेक्षा माझ्यावर कोसळलेला आघात कैकपटीने अधिक होता. तिच्याजवळ निदान बिट्टू तरी आहे, मी मात्र पूर्णपणे एकटा पडलोय. माझ्याच मुलाला मला सोडून जावे लागले. आजवर घटस्फोट हा शब्द मला इतका कडवट आणि विखारी कधीच वाटला नव्हता, जितका तो मला आज डागण्या देत होता. या चार अक्षरी वरवर साध्या भासणाऱ्या शब्दाने माझे स्वतःचे अस्तित्वच माझ्यापासून हिरावून घेतले होते. आज मी माझ्यापासूनच विलग झालो होतो. आपल्या मुलापासून वेगळे होणे आणि वर्षानुवर्षे खपून एक एक काडी जोडून बांधलेल्या माझ्या उबदार घरट्यातून बाहेर पडणे या गोष्टी अशा होत्या, जणू कांही माझ्या आत्म्याला माझ्या देहातून निघून जाण्याचे आदेश देण्यात आले होते. मला सांगण्यात आले होते की जा आणि जशी इच्छा असेल तसे मनस्वीरित्या जग!

त्या सुखद काळी आम्ही एकमेकांना आनंदात ठेवण्यासाठी यादी बनवायचो. आता मात्र त्याच यादीत आरोपांची सरबत्ती केल्या जाऊ लागली होती. तिच्याकडूनही आणि माझ्याकडून देखील. जेव्हां दोन भांडी पोळपाट लाटण्यासारखी प्रेमाने एकत्र नांदत होती, तेव्हां लाटण्याचा वापर आयुधासारखा नव्हे तर पोळ्या लाटण्यासाठी व्हायचा. तेव्हां आम्ही घर परिवाराचे एकत्रिपणे पालनपोषण करीत होतो. मात्र हीच भांडी जेव्हां एकमेकांना भिडून आदळआपट करायला लागली तेव्हां त्या वारंवार आघाताच्या आणि प्रतिघाताच्या माऱ्याने पिचून पिचून त्यांच्या ठिकऱ्या उडाल्या. भांड्यांसारखे घराचे देखील तुकडे होऊन ते दिशाहीन दिसू लागले. वर्षानुवर्षे ज्या प्रेम आणि विश्वासाच्या पायावर आमचे घर ठामपणे उभे होते, त्याचा पायाच आता डळमळीत झाला होता. याची शिक्षा आम्हाला भोगावी लागतेय. मला, तिला आणि माझ्या लहानग्या बिट्टूला देखील!

तिच्याजवळ बिट्टू होता, तिच्या मुखावर हास्य फुलण्याचे हे एक कारण निश्चितच होते. तो तिला नक्कीच प्रसन्न ठेवणार. तो तिला एकटेपणाची जाणीव देखील होऊ देणार नाही. बिट्टू माझी किती आठवण करेल हे मला जाणवत होते. समुद्रकिनारी अवचितपणे माझ्या जवळ आलेले हे मूल कदाचित त्याच्या बाबांना शोधत आले असावे. कदाचित असे नसेलही, पण तरीही माझ्याकडे येण्याचे काही कारण असेल तर, हेच एकमेव कारण असणार याची मला खात्री होती.

हे दुःस्वप्नाहून अति भयानक वास्तव होते. प्रलयंकारी! क्रूर कालगतीने बिट्टूला माझ्यापासून हिसकावून नेले. असा कठोर दंड किती वेदनादायक असतो. या असहनीय पीडेने एका चालत्या बोलत्या जीवनाला पूर्णविराम देत संपवूनच टाकले. माझ्यासाठी तर आता संपूर्ण जगच थांबल्यासारखे वाटत होते. जणू काही माझ्या शरीरातील प्रत्येक भाग अखिल धरणीसह बधिर झाला होता आणि त्यांनी कामाशी असहकार पुकारला होता. त्या माझ्या परमप्रिय घरातून माझे शरीर निघून गेले, पण मी खरोखरच त्यातून बाहेर येऊ शकलो कां? आपल्याच घरापासून स्वतःला असे विलग करणे किती कष्टप्रद असते, जणू काही तिथे तुमचे स्वतःचे काहीही नव्हते!

तसे तर मी समुद्रकिनारा न्याहाळत होतो, पण होरपळून टाकणाऱ्या जळजळीत उन्हामुळे आणि माझ्या अंतरंगाला चटके देणाऱ्या आतील अग्नीच्या मिश्रित झळीमुळे माझे डोके जड होत होते. मी बाहेरच्या कडक उन्हापासून वाचण्याचा फक्त प्रयत्नच करीत राहिलो, कारण तिथे सावली देणारी हिरवी झाडे किंवा कोणत्याही प्रकारचे छप्पर दृष्टीस पडत नव्हते. माझ्या अंतर्यामी देखील प्रेमाच्या सावलीचा संपूर्ण अभाव होता. तप्त उन्हाचे चटके लाल अंगारांसारखे जळत आणि जाळत होते. मी असहाय्य आणि लाचारासारखा हे सर्व सहन करीत होतो. वर भाजणारे मोकळे अस्मान आणि खाली उन्हाचा तडाखा अंगावर झेलणारी उघडी बोडकी धरणी.

संध्याकाळ दाटून येण्यापूर्वी धूर देखील गर्द गडद होणार. या वेळी तरी तीव्र सूर्यप्रकाशाने उष्णता कायम ठेवत आपले वर्चस्व राखले होते. मी सूर्यस्नान करण्यासाठी नव्हे तर सागराच्या शीतल लहरींमध्ये सचैल भिजण्यासाठी आलो होतो. माझ्या आत पेटलेल्या वणव्याला शांत करण्यासाठी मी तळमळत होतो. मी लाखोंनी पैसे गमावले होते, मात्र मला त्याची पर्वा नव्हती. पण माझा लाडका बिट्टू? मी त्याला कसं विसरू? एखाद्याच्या आत्म्याला शरीरापासून तोडून वेगळे करणे इतके सोपे कां आहे? मानसिक यातना देण्याचे हे सर्वात तीक्ष्ण शस्त्र आहे.

मला तर आनंद व्हायला हवा होता कारण रोजच्या कटकटीतून मी एकदाचा मुक्त झालो होतो. पण नाही, पराभूत झालेल्या व्यक्तीला प्रत्येक वेळी पराभवाचाच अनुभव येतो. तिथे निदान बिट्टूसोबत तरी राहिलो असतो. त्याच्या एका गोड हास्याने मला सर्व कांही परत दिले असते. म्हणून तर त्याच्यापासून दूर राहून फक्त फक्त एक दिवस सुद्धा लोटला नव्हता आणि मी त्याच्या स्पर्शाकरिता इतका व्याकुळ झालो होतो.

पिता होणे इतके कष्टदायक का आहे? नऊ महिने कोणा दुसऱ्या व्यक्तीच्या पोटात आपले मूल वाढतांना पाहतांना आणि अनुभवतांना माझी खूप तडफड व्हायची. मी माझे कान लिलीच्या पोटावर टेकवून बाळाच्या हृदयाचे ठोके ऐकण्याचा प्रयत्न करायचो. दररोज, माझी नजर त्या न जन्मलेल्या बाळामध्ये माझे स्वतःचे प्रतिबिंब शोधत होती. कसं होईल? सगळं ठीक असेल ना आत? आणि आता या घटकेला घटस्फोटानंतर, माझा अंश असलेल्या त्याच बाळाला त्याच्या आईकडे सोडून आलोय मी. जणू काही आता माझा त्याच्यावर कुठलाच अधिकार नाही. काय ही जबर शिक्षा! मीच कां म्हणून भोगायची? कारण मीच पिता आहे ना. त्याला न भेटल्याचे विदीर्ण करणारे क्लेश आणि त्या जखमेवर मीठ चोळणारा कायद्याचा आसूड. त्याच्या तिळातिळाने वाढणाऱ्या अंगप्रत्यंगाचा साक्षीदार असलेला मी एकाएकी त्याच्या आयुष्यातून वजा झालो.

माझा ताणतणाव कमी करण्यासाठी समुद्रकिनाऱ्यावर येणे मला आता निरर्थक भासू लागले. शरीर कुठेही असले तरी, मन तर ज्या स्थानाशी जोडल्या गेलंय, तिथेच राहण्यासाठी तळमळत असते ना! माझे डोळे गडद अंधाराशिवाय कांहीच बघू शकत नव्हते. इतका मिट्ट काळोख असल्यावरही प्रभातीचा प्रकाश येऊ शकेल कां? कितीही अंधार असला तरी उगवतीच्या उजेडाला तो थोडाच रोखू शकतो? पण दुर्दैवाने प्रत्येक उगवतीला प्रकाशाची सोबत नसते. काही प्रभात बेला इतक्या काळ्याभोर असतात की येणाऱ्या कित्येक तेजोमय दिवसांना देखील त्या आपल्या कृष्णरंगाने झाकोळून टाकतात.

मला आता कळते आहे, मला प्रत्येक येणाऱ्या दिवशी या सर्व भावनिक कल्लोळाचा सामना करावा लागणार आहे. वाटले होते की मनमोहक निसर्गाने वेढलेल्या या स्थानी मला थोडेफार समाधान मिळेल आणि खरं सांगायचे तर ते मिळाले सुद्धा! माझ्या माथ्यावर एक सुखद समाधान रेंगाळले. कपाळावर जाणवला त्याच मऊसूत तळहाताचा मखमली स्पर्श. मी डोळे उघडले तर ते गोड गोजिरे बालक माझ्याकडे बघत खोडकरपणे हसत होते. त्याने लगेच पळून जाऊ नये आणि मला त्याचा सुगंधी स्पर्श दीर्घकाळ जाणवत राहावा म्हणून मी लगेच डोळे मिटले. यावेळी मी ठरवले की हे मधुर स्वप्न खंडित होऊ नये म्हणून मी डोळेच उघडणार नाही. बस, त्याच्या या बाललीला अनुभवीत राहीन. कदाचित या खेळातून त्याला माझ्यात त्याच्या पित्याचे अस्तित्व जाणवत असेल आणि मला त्याच्यात माझ्या मुलाचे! या क्षणी आम्हाला दोघांनाही एकमेकांची नितांत गरज होती. आम्ही आपसात बोलत नव्हतो, पण एकमेकांच्या स्पर्शातील मूक संवाद सर्व कांही सांगत होता. जणू आमच्या जिभेवर गूळ होता. त्याची गोड चव जिभेला माहित होती, पण त्याचे वर्णन करायला ती असमर्थ होती. आमच्या नजरानजरेतून ती मिठास मानसिक समाधान देऊन जात होती. त्याची आणि माझी इच्छा या दोन्हींचा जणू समाहित मधुरस!

मी डोळे उघडलेले नाहीत असे बघितल्यावर त्याचा मधुर किलबिलाट सुरु झाला. दुरून त्याच्या आईची साद ऐकू आल्यावर देखील तो जागचा हलला नाही. त्याच्या आईने जवळ आल्यावर त्याला हाक मारल्याने मी लगेच डोळे उघडून त्याच्याकडे डोळे भरून पाहिले आणि तोही निघून गेला. जातांना त्याच्या चेहेऱ्यावर खोडकर हास्य विलसत होते. मी देखील ‘बुडत्याला काठीचा आधार’ या न्यायाने त्या हलक्याश्या स्मिताचे बोट धरून पैलतीर गाठून स्वतःचा जीव वाचवला होता. एक क्षितीजाच्या रेखेसारखी अस्पष्ट आशा. धुराचे लोट पुन्हा दाटत होते, जणू आम्हाला घरी परतण्यासाठी ताकीद देत होते. जंगलालाही सारखे सारखे जळत राहिल्याने जणू ग्लानी आली होती. या जाळपोळीच्या भीषण कलहातून त्याला जणू स्वतःला वाचवायचे होते. मला आणि त्या मुलाला देखील हेच हवे होते. आमच्या सर्वांच्या आतले जंगल अग्नीचा घास घ्यायला तयारच होते. आगीला कवेत घेत ते बुभुक्षित वन धुराची वलये फेकीत जणू सिगारेटचा आस्वाद घेत होते.

माझ्यापासून दूर जाताना त्या मुलाने जोरात किलबिल केली. मी त्या संकेताला ओळखत त्याला प्रेमभरल्या नजरेने पाहिले. आमच्या दोघांतील मूक भाव एकमेकांना म्हणत होते, “पुन्हा भेटू या! ” मी जाणत होतो की हे निव्वळ मृगजळ होते. मात्र माझ्या माथ्यावर त्या गोजिरवाण्या स्पर्शाची अनुभूती अजूनही रेंगाळत होती.

त्या आश्वस्त करणाऱ्या शांत शीतल नजरेने ऋतुमानाला देखील पाझर फुटला होता. काळे सावळे कृष्णमेघ अंबरात दाटीवाटीने गर्दी करीत होते.

हे वरूण राजा! त्या निष्पाप बालकासाठी तरी कृपा करून जलवर्षाव कर, जेणेकरून प्रत्येक रानावनात धुमसत असलेला कोपिष्ट अग्नीदेव शांत होईल!

समाप्त –  

हिन्दी कथालेखिका : डॉ. हंसा दीप 

संपर्क – Dr. Hansa Deep, 22 Farrell Avenue, North York, Toronto, ON – M2R1C8 – Canada

दूरभाष – 001 + 647 213 1817, ई-मेल – hansadeep8@gmail.com

मराठी अनुवाद : डॉ. मीना श्रीवास्तव 

ठाणे

मोबाईल क्रमांक ९९२०१६७२११, ई-मेल – drmeenashrivastava21@gmail.com

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ आग – भाग २ (भावानुवाद) – हिन्दी कथाकार : डॉ हंसा दीप ☆ डाॅ. मीना श्रीवास्तव ☆

डाॅ. मीना श्रीवास्तव

? जीवनरंग ?

☆ आग – भाग २ (भावानुवाद) – हिन्दी कथाकार : डॉ हंसा दीप ☆ डाॅ. मीना श्रीवास्तव 

डॉ. हंसा दीप

(गरम वाळू माझ्या शरीराला खोलवर टोचत होती. मला हेच तर हवे होते. एकाच वेळी जितकी जमेल तितकी उष्णता देऊन टाक म्हणावं. उष्णतेला तोंड देण्यासाठी समुद्राचे जलसिंचन तयार होतेच. पाण्यात डुबकी मारून झाल्यावर ते सुकवण्यासाठी फिरून गरम उन्हात सूर्यस्नान. क्रिया आणि प्रतिक्रिया यांचा पाठशिवणीचा खेळ!) इथून पुढे – – 

तेजस्वी सूर्याच्या दाहकतेमुळे आगीचे धूम्रवलय जरा आक्रसलेले वाटत होते. सायंकालीन प्रहराचे रंग गडद होता होता धुराने आकाशाला पुन्हा एकवार कवेत घेतले. रेतीवर पहुडलेल्या उन्हात लोक मनसोक्त लोळत होते. कित्येक महिन्यांच्या निष्ठुर हवामानाला वैतागलेले ते सर्वजण आता सूर्यस्नानाचा मनमुराद उपभोग घेत होते. समुद्र आणि त्याच्याच किनारी तप्त रेती! जळी आणि स्थळी पृथ्वीचीच दोन्ही रूपे दृष्टीस पडत होती.

सागरतीरावर सूर्यस्नान करणारे हे लोक त्याच्या अपार आनंदाचा अनुभव घेण्यात खरंच इतके दंग झाले होते कां की वाळूवर चालताना त्यांचे पाय देखील पोळत नव्हते?  निरभ्र आकाशातून सूर्यदेवाने सर्वदूर फेकलेल्या रवीकिरणांच्या जळजळीत जाळीत अडकून त्यांच्या चेहेऱ्याची गोरीपान त्वचा लालबुंद झाली होती. त्यांच्या पाठी आणि कडा देखील तितक्याच लालेलाल झाल्या होत्या. समुद्रचौपाटीवरील वाळूने व्यापलेली जमीन खडबडीत होती आणि त्यामुळे त्यांच्या अनवाणी पायांना चांगलीच टोचत होती. मात्र त्याची तमा न बाळगता वाळूच्या कणांना आपल्या पायांना मुक्तपणे चिकटण्याची मुभा देण्यासाठी प्रत्येकजण पादत्राणे काढून टाकीत मस्तीत पळत होता.

काही तरुणांनी दोन लाकडांच्या मदतीने नेट लावले होते. तिथे लहान व मोठे सर्वजण एकत्र बॅडमिंटन खेळत होते. दुसरीकडे बास्केटबॉलचा खेळ जोरात सुरू होता. जवळच कुठे तरी काही मुले डिस्क फेकत होती. दोन- चार पाळीव कुत्रे त्यांच्या मालकांसह पाण्यात आणि वाळूमध्ये धमाल मस्ती करीत होते. इतक्या गर्मीत सगळ्यांच्या शरीरातून घामाच्या धारा वाहत होत्या. माणसे एकमेकांच्या जवळ आली की त्या घामाचा तीव्र वास एखाद्या पक्ष्यासारखा एका शरीरापासून दुसऱ्या शरीरापर्यंत मुक्त संचार करीत होता. या दर्पाद्वारे एका नाकापासून दुसऱ्या नाकापर्यंतचे अंतर आरामात मोजल्या जात होते.

जेव्हा एखादी व्यक्ती एकाकी पडते तेव्हाच तिचे इतरांकडे लक्ष जाते. तिथल्या प्रचंड गर्दीत देखील मी एकटा होतो. संपूर्णतः एकटा. माझ्यासमोर जलाने तुडुंब भरलेला सागर होता तर माझ्या डोळ्यांतही अश्रूंचा महासागर उसळला होता, राहून राहून त्याला भरती येत होती. मला ओलेत्या डोळ्यांचा पूर्ण तिरस्कार आहे. त्यांच्यासारखा अत्याचारी कोणी नसेल! ते सकळ शरीराचा भार आपल्या नाजूक खांद्यांवर उचलत फिरत असतात. जेव्हां शरीराचे अंगप्रत्यंग जळत असते तेव्हां हेच डोळे ओले होतात. जसजसे डोळे अश्रूंचे सिंचन करतात तसतसे त्या व्यक्तीचे शरीर शीतल होत जाते. किमान समुद्रासमोर तरी माझ्या डोळ्यांत पाणी येऊ नये असे मला वाटत होते, पण नाही, वेगाने बरसणाऱ्या अश्रूंच्या धारा माझी पीडा थेंबाथेंबाने कमी करण्याचा प्रयत्न करत होत्या.

माझ्यासमोरचा समुद्र जणू काही मला समजावत होता, “अरे! डोळ्यात अश्रूंचे दोन थेंब आले की तू दुःखी होतोस. माझ्याकडे बघ, मी तर नेहमीच अंतर्बाह्य पाण्याने काठोकाठ भरलेला असतो. “

निसर्गाशी संवाद साधणे हा देखील माझा एकाकीपणा थोड्या प्रमाणात कमी करण्याचा जणू प्रयत्न होता. मात्र या रम्य निसर्गाच्या सानिध्यातही जन्मजात मानवी स्वभाव निसर्गावर आपले वर्चस्व स्थापित करण्यात गुंग होता. झाले असे की, कोणीतरी कोणा एका स्त्रीचे पाकीट चोरले होते. त्या पाकिटात त्या बिचाऱ्या महिलेचे सर्व क्रेडिट कार्ड आणि रोख रक्कम होती. ती निराश होऊन आपले पाकीट मिळते का हे वाळूत चाचपडून शोधत होती. क्रेडिट कार्ड रद्द होतीलही, पण हरवलेल्या नगदी पैशाचे काय?  ती तर मौजमजा लुटायला सहलीला आली होती, मात्र आता तिचे पाकीट लुटल्या गेले होती. आता जातांना ती रिकाम्या हाताने पण चिंताग्रत मस्तक सोबत घेऊन जाणार होती.

दुसऱ्या बाजूला, एक लहान मूल सतत रडत होते. त्याच्यासाठी, घर आणि घराबाहेर या दोहोंमध्ये कांहीच फरक नव्हता. त्याच्या घराची शीतल छाया किंवा बाहेरील तापलेले ऊन या दोहोंशी त्याला कुठलेच सोयरसुतक नव्हते. इतकंच नव्हे तर त्याला लगटून वाहणारा प्रबळ प्रवाह त्याच्या असहमती दर्शवणाऱ्या रडण्यात आपला सूर मिसळीत होता.

रेतीत अर्धवट पहुडलेल्या अल्पवस्त्रांकित लोकांची तुफान गर्दी. नजर पोहोचेल तिथवर अर्धनग्न लोकांचे जणू जंगल राज, पुरुष आणि स्त्रियांचे! आरामखुर्च्यांवर अस्ताव्यस्त पसरून ते मदमस्त अवस्थेत तप्त रवीकिरणांना जमेल तितके अंगावर झेलत होते. कित्येक महिन्यांच्या बर्फाळ थंडीने आक्रसलेल्या कॅनडासारख्या शीतल देशांमध्ये सूर्यकिरणांचे असे जंगी स्वागत होत असे. लज्जारक्षणापुरती वस्त्रे घातलेले बहुतेक तरुण पुरुष आणि स्त्रियांच्या झुंडीच्या झुंडी सूर्यस्नानामुळे स्वतःच्या शरीराची बदलती लालेलाल त्वचा कौतुकाने न्याहाळत मजा करीत होते, जणू कांही पिकलेल्या फळाचा आस्वाद घेण्याआधी ते त्याचा मधुर सुवास नाकात भरून घेत होते.

जर दुसरा वेळवखत असता तर मी त्या सर्वांना अनिमिष नेत्रांनी बघत राहिलो असतो. मनातल्या वखवखत्या आदिम इच्छा जागृत झाल्या असत्या. एरवी निषिद्ध असलेली वासनापुष्पे माझ्या मनात नकळत फुलण्याचा प्रयत्न करत असती. लख्ख सूर्यप्रकाशाचा झगमगाट आणि त्याची उष्ण धग अचानक मायाविनी वाटत असती. स्वतःच्या बेफाम कामनांवर अंकुश ठेवणे तर अशक्यच झाले असते. पण नाही! त्या वेदनादायक क्षणांमध्ये आयुष्याचे सकल गुलजार रंग हरवले होते. उरली होती ती ती फक्त निशाचरांचे साम्राज्य असलेली कधीही न संपणारी निराशेने ग्रस्त काळीकुट्ट रात्र. वर्षानुवर्षांपासून जपलेल्या अलवार नात्यांची आता उरली होती उसवलेली वीण. काळजाला आरपार छेदणारी असह्य वेदनेची कट्यार, क्षणोक्षणी विलाप करणारे विरहग्रस्त मन! हृदय पिळवटून टाकणारे एका पित्याचे दुःख कसे काय कमी होणार होते?  कायद्याच्या कर्तव्यकठोर साखळ्यांत जखडलेले माझे अपत्यप्रेम! मला किती भयानक शिक्षा मिळाली होती आपल्याच मुलापासून वेगळे राहण्याची.

जवळच एक युगुल होते. बहुदा घरी भांडण केल्यावर इथे आले असावेत. या सुंदर सागरतीरी देखील कलहाचा अध्याय सुरुच होता. विरुद्ध दिशांना तोंडे फिरवून फुरंगटून बसले होते दोघेही! मला अशा सर्व प्रकारच्या वादविवादापासून कायमची मुक्ती मिळालेली होती. निसर्गशोभेत रममाण होण्याकरिता मी एकटाच आलो होतो, घरच्या ताणतणावाने कातावलेल्या त्या खोलीपासून खूप दूर. पण इथे येऊन बघितल्यावर जाणवले की या लाटांच्या तडाख्यांना झुंज देणारा मी एकटाच नव्हतो. प्रत्येकाच्या आयुष्यात त्याच्या त्याच्या स्वतंत्र समस्या होत्या.

हळूहळू संध्याकाळच्या लांबसडक सावल्या पडायला सुरुवात झाली. घरी जाण्याची वेळ जवळ जवळ येत चालली होती, मी मात्र त्याच घरकुलापासून दूर पळत होतो. आता कुठले घर?  कोणे एके काळी माझे असलेले ते उबदार घरटे आता माझे राहिले नव्हते. मी संबंधविच्छेद झाल्या क्षणी अनिकेत झालो होतो. आता मला एक नवीन घर शोधावे लागणार होते. आधीच्या माझ्या मालकीच्या घरावर माझा कोणताही अधिकार नव्हता. आतल्या आणि बाहेरच्या उष्णतेची प्रखर झळ एकत्रित होत एका भीषण ज्वालामुखीच्या निर्मितीत गुंतली होती.

विचार करत असतांनाच माझा डोळा लागला. एकाएकी माझ्या माथ्यावर एका कोवळ्या तळहाताचा मृदुल अलवार स्पर्श जाणवला.

मी दचकलो. माझा मुलगा तर माझ्यापासून दूर गेला होता. आता माझ्या कपाळावर कोणाचा कोमल हात होता बरे?  तोच तर आहे हा! कदाचित माझ्या आठवणीने नकळत त्याला माझ्यापर्यंत इथवर खेचून आणले असावे. मी घाबरून डोळे उघडले. वाळूने नखशिखांत माखलेला एक लहानगा मुलगा गुडघ्यावर रांगत माझ्या पर्यंत पोचला होता आणि माझ्या डोक्यापाशी बसला होता व माझ्या माथ्याला कोमल स्पर्श करत होता. तो माझ्या बिट्टूसारखा तर दिसत होता, पण… तो माझा बिट्टू नव्हताच. त्यावेळी मी त्याच्याकडे नीटसे पाहिलेही नव्हते, तोच त्याची आई तडक तिथे आली आणि ‘माफ करा’ असे म्हणत त्याला घेऊन देखील गेली!

किती नाजूक रेशमी स्पर्श होता तो! नाजूक, वत्सल, मुलायम!

मी हतप्रभ झालो, आत्ता कुठे आला होता अन लगेच गेला सुद्धा! अरेरे! त्याचा मृदुल हात माझ्या कपाळावर आणखीन थोडा काळ राहिला असता तर किती बरं झालं असतं. माझ्या अंतर्यामी धगधगणारी आग काही प्रमाणात शांत तरी झाली असती! तो अनोळखी बच्चू गोड आठवणी जाग्या करून गेला. मला क्षणभरासाठी असे वाटले की मी बिट्टूसोबत लपंडावाचा खेळ खेळतोय. तो बिलंदरपणे कुठेही लपून बसायचा. मी शोध शोध शोधायचो तरी बेटा मला गवसायचा नाहीच. मी जेव्हा जेव्हा त्याच्या जवळून जायचो तेव्हां विजयी मुद्रेने तो टाळ्या पिटत खळखळून हसायचा. या उलट मी जेव्हां लपायचो तेव्हा तो मला लगेचच हुडकून काढायचा. तो अजून बोलायला शिकला नव्हता, पण त्याच्या बोलक्या डोळ्यांनी तो माझ्याशी अखंड बोलत असायचा.

या मुलाचे डोळे देखील माझ्या बिट्टूसारखेच बोलके आणि भावस्पर्शी होते. काय हा नियतीचा डाव! कालपर्यंत माझा मुलगा माझ्या निकट होता, पण आज मी इतका असहाय झालो आहे की, एका परक्या बालकात माझ्या स्वतःच्या मुलाचे प्रतिबिंब शोधतोय. मी त्याला माझ्यासोबत ठेवू इच्छित होतो. पण मी काय करू शकत होतो?  महिनोन्महिने अन्यमनस्क होऊन जगलेल्या निरुद्देश आयुष्याचे कमजोर धागे काल पूर्णपणे तुटले. इथे सागरतीरी येऊन माझ्या अस्वस्थ मनाला थोडाफार विरंगुळा देऊ इच्छित होतो. म्हणूनच समुद्रकिनाऱ्यावरही मी माझ्या आयुष्याला पूर्णपणे उद्ध्वस्त करीत चक्रीवादळ निर्माण करणाऱ्या लाटा मोजत बसलो होतो.

न्यायालयाने आमचा घटस्फोट मंजूर केला होता आणि अधिकृतपणे मला तात्काळ घर सोडण्याचा आदेश दिला होता. माझ्या नशिबाने नोकरी सुरक्षित होती. आर्थिक अडचणी नव्हत्या. परंतु बायको आणि मुलापासून दूर राहण्याच्या नियमाचे काटेकोरपणे पालन करण्यासाठी कोर्टाने एक नाही तर अनेक बाबींचे काटेकोरपणे पालन करणे माझ्यासाठी सक्तीचे केले होते.

“तुम्ही आपल्या पत्नीशी अर्थात लिलीशी कुठल्याही प्रकारचा संपर्क ठेऊ नका. “

“मुलगा वयस्क होईपर्यंत तुम्ही त्याला महिन्यातून फक्त दोन तासांसाठी त्याला भेटू शकता”

“अशा भेटी फक्त त्याच्या आईच्या उपस्थितीतच व्हायला हव्यात. ” 

“त्याच्याभोवती कधीही घोटाळत राहण्याचा प्रयत्न करू नका. “

जणू काही मी एक पिता नसून एखादा गुन्हेगार होतो, जो त्याला हानी पोहोचवू शकत होता. मी कल्पनेतही कधी कोणताच गुन्हा केला नव्हता. असे शक्य तरी होते कां की प्रत्यक्ष माझ्या प्रिय मुलाला मी कोणत्याही प्रकारे दुखापत करू शकेन?  

– क्रमशः भाग दुसरा

हिन्दी कथालेखिका : डॉ. हंसा दीप 

संपर्क – Dr. Hansa Deep, 22 Farrell Avenue, North York, Toronto, ON – M2R1C8 – Canada

दूरभाष – 001 + 647 213 1817, ई-मेल – hansadeep8@gmail.com

मराठी अनुवाद : डॉ. मीना श्रीवास्तव 

ठाणे

मोबाईल क्रमांक ९९२०१६७२११, ई-मेल – drmeenashrivastava21@gmail.com

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares