मराठी साहित्य – जीवनरंग ☆ एका स्त्रीचा अपूर्ण श्वास… ☆ सौ.प्रभा हर्षे ☆

सौ. प्रभा हर्षे

? जीवनरंग ?

☆ एका स्त्रीचा अपूर्ण श्वास… ☆ सौ.प्रभा हर्षे

रात्रीचे अकरा वाजले होते. संपूर्ण घर झोपेत बुडालं होतं.

फक्त स्वयंपाकघरातून येणारा मंदसा छन-छन आवाज त्या शांततेला भेदत होता.

टेबलवर अर्धवट जेवलेले ताट ठेवलेलं होतं… भाजी थंड झाली होती, पोळी कडक झालेली,

आणि अनाया त्या ताटाकडे बघत होती.

तिच्या डोळ्यात झोप नव्हती, फक्त थकवा आणि ओलसरपणा होता.

दाराच्या पलीकडून कुणीतरी डोकावलं, पण तिला पाहणारा कोणीच नव्हता.

पहाटे पाच वाजता घरातील सगळे अजूनही निजलेले, आणि अनाया झाडू हातात घेऊन स्वयंपाकघरात कामाला लागलेली.

– – गॅसवर दूध ठेवलेलं, सासूबाईंसाठी चहा तयार होत होता, मुलांच्या डब्यासाठी आलू पराठे बनवले होते,

आणि नवरा रोहनचा शर्ट प्रेस होत होता.

“इतका उशीर का झाला? माझा चहा थंड झाला! ”.. सासूबाईंचा रोजचा ओरडा कानावर पडला.

अनाया काहीच बोलली नाही. फक्त मान खाली घालून तिने पुन्हा चहा बनवला – जणू तिने आपल्या तोंडाला कुलूप लावलं होतं.

रोहन ऑफिसला जाताना फक्त एवढंच म्हणाला, “कपडे नीट ठेव, मीटिंग आहे, उशीर होतोय मला. ”

ना “निघतो” म्हटला, ना “काळजी घे. ”

– – फक्त चाव्या टेबलावर आपटल्या आणि निघून गेला.

दुपारपर्यंत घर चमकत होतं,… पण ती स्वतः मात्र फिकी दिसत होती.

.. सासूबाई त्यांच्या कमरेच्या दुखण्याचं रडगाणं गात होत्या,

.. सासरे टीव्हीवर बातम्या पाहत होते,

.. मुलं शाळेत होती..

.. आणि ती भिंतीला टेकून बसली होती.

– – तिच्या बोटांपर्यंत थकवा पोहोचला होता, तरीही ती सगळ्यांसाठी जेवण बनवत होती.

जेव्हा ती स्वतः जेवायला बसली, तेव्हा भाजी थंड, पोळी कडक झाली होती.

तेवढ्यात दरवाजाची बेल वाजली. शेजारच्या माधवीताई आल्या… 

“अगं अनाया, तू दिवसभर या कामातच गुरफटलेली असतेस! थोडा वेळ स्वतःसाठीही काढ ना! ”

अनाया हसण्याचा प्रयत्न करत म्हणाली – (ते हसू तोंडावर होतं, मनात नव्हतं)

“वेळ माझ्या वाट्याला फक्त झाडू आणि भांडी घेऊनच आला आहे, ताई. ”

सायंकाळी मुलं परत आली.

त्यांच्यासाठी दूध, खाऊ, गृहपाठाचा डोंगर तयार होता.

रोहन आला तेव्हा फोनवर कुणाशी तरी बोलत हसत होता.

“आज ऑफिसमध्ये खूप काम होतं का? ” अनायाने हळूच विचारलं.

तो म्हणाला, “हो, थकलोय, ” आणि थेट टीव्हीसमोर बसला.

– – अनाया काही बोलू पाहत होती…

“मीसुद्धा थकलेय, रोहन…”

पण तिचे ओठ बंद झाले. कारण तिला ठाऊक होतं, या घरात तिला थकण्याचा हक्क नव्हता.

रात्र गडद झाली. मुलं झोपली, सासू-सासरे त्यांच्या खोलीत गेले.

अनाया अजूनही स्वयंपाकघरातच होती – गॅस बंद करत होती, सिंक पुसत होती, उद्यासाठी भाजी चिरत होती.

– – अचानक तिचं डोकं गरगरलं, तिने भिंतीचा आधार घेतला. डोळे मिटले,.. आणि कधी झोप लागली हे कळलंच नाही.

रात्री दोनच्या सुमारास रोहन जागा झाला. स्वयंपाकघराची लाईट लागलेलीच होती.

तो चिडला, “ही अजून काय करतेय? ”

तो तिथं गेला.. अनाया खुर्चीवर बसलेली,.. डोकं खाली, पूर्ण शांत.

“अगं अनाया, झोपलीस का? ” – – कुठलाही प्रतिसाद नाही.

त्याने खांदा हलवला – शरीर गार झालं होतं.

त्याच्या हातातून पाण्याचा ग्लास खाली पडला. तो किंचाळला – “आई! आई! ”

सगळं घर धावत आलं. डॉक्टर आले.. पण उशीर झाला होता – – 

डॉक्टर म्हणाले,

“शरीर पूर्ण थकलं होतं… कदाचित अनेक दिवस तापात होती, पण विश्रांती घेतली नाही. ”

रोहनच्या कानात जणू कुणीतरी हातोडा मारला.

तो पुटपुटला –

“पण तिने कधी सांगितलंच नाही की ती आजारी आहे. ”

डॉक्टर शांतपणे म्हणाले –

“सांगण्यासाठी ऐकणारा तरी हवा ना. ”

सकाळ झाली.

सूर्य उगवला, पण त्या घरात काळोख होता.

स्वयंपाकघरात तेच अर्धवट ताट पडलं होतं… थंड आणि निःशब्द.

सासूबाई चहा बनवत रडत होत्या,

“कधी विचारच केला नाही की ती इतकं सहन करत होती. ”

मुलांनी विचारलं, “आई कुठे आहे? ”

रोहन काहीच बोलू शकला नाही.

काही दिवस गेले.

घर चालू होतं, पण जीवन थांबलं होतं.

एका संध्याकाळी रोहनला कपाटात एक डायरी सापडली – वर लिहिलं होतं, “माझं मौन”.

पहिलंच पान उघडलं, आणि डोळ्यातून अश्रू ओघळले –

“आज ताप आहे, पण काम तर करायचंच आहे मला. मी थांबले तर हे घर थांबेल. कुणी विचारेल का की मी ठीक आहे का? बहुतेक नाही… मी आता एक मशीन झालेय, जी सकाळी सुरू होते आणि रात्री बंद होते. ”

“मला भीती वाटते की एखाद्या दिवशी मी कोसळेन, आणि कुणाला कळणारही नाही. कदाचित तेव्हा लक्षात येईल — 

– – घर भिंतींनी नाही… एका स्त्रीच्या श्वासांनी चालतं. ”

शेवटच्या ओळीवर रोहन थांबला – “जर माझ्या जागी कधी दुसरी कुणी आली, तर तिला एवढंच विचार…

“थकलीस का? “… हे शब्द एखाद्याचं आयुष्य वाचवू शकतात. ”

रोहनचे हात थरथरू लागले.

… त्याचे डोळे पाण्याने भरले. पहिल्यांदा तो खऱ्या अर्थाने रडला.

त्या दिवसानंतर त्याने स्वयंपाकघरातले ते ताट जपून ठेवले… 

आठवण म्हणून की…

स्त्रीची मेहनत कधीच हलकी नसते – – जरी तिचा आवाज कुणाला ऐकू येत नसला तरीही.

प्रत्येक घरात एक “अनाया” असते… जी सगळ्यांची काळजी घेते, पण स्वतःला विसरते.

ती बोलत नाही, पण तिचे हात, तिचे डोळे, आणि तिचा थकवा रोज ओरडतो.

… कधी तिच्या शेजारी बसून फक्त एवढंच विचारा –

“थकलीस का? ”

… कारण हेच शब्द एखाद्याचं जीवन वाचवू शकतात.

लेखक : अज्ञात

प्रस्तुती : सुश्री प्रभा हर्षे

 ९८६०००६५९५

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ तांबड्या माठाची भाजी… भाग – २ ☆ सुश्री नीला महाबळ गोडबोले ☆

सुश्री नीला महाबळ गोडबोले

??

☆ तांबड्या माठाची भाजी… भाग – २ ☆ सुश्री नीला महाबळ गोडबोले

(पीठ पेरून असो, डाळ घालून असो नाहीतर गोळा भाजी असो.. पोळीबरोबर किंवा भाकरीबरोबर… मेथी स्वत:च्या गंधाची पदोपदी जाणीव देत असते.. अगदी दुसरे दिवशीपर्यंत…) –

इथून पुढे —-

ताकातला पालक, ताकातलं चाकवत किंवा अळूचं फदफदं… गरम गरम आंबेमोहर किंवा इंद्रायणीचा मऊसर भात, त्यावर भरपूर लोणकढं तूप… तो भात पाचही बोटांनी शिते मोडेपर्यंत कालवावा आणि एकेक घास करून त्यावर ही पातळ भाजी ओतून तो घास पुन्हा कालवावा नि पाच बोटांनी तोंडात घालावा. जिव्हा आणि आत्मा असा काही तृप्त होतो की जगणं जगणं रहात नाही.. त्याचं गाणं होऊन जातं!

बटाट्याची बातच और… वरून नशीब घेऊन आलेला… त्याचं काहीही केलं तरी सोनच व्हावं असा!

उगाच नाही राहुल गांधी बटाट्याचं सोनं बनवणारं मशीन करणार होता!

तर अशा या भाज्या… किती नावं घ्यावीत त्यांची नि किती वर्णन करावं त्यांचं?

रोजच्या जेवणात वैविध्य निर्माण करणा-या या भाज्या ” कोणती भाजी करावी? ” या रोजच्या प्रश्नचिन्हानं गृहिणींना सतावणा-या नि “अमुक भाजी करावी तर सुधानेच बरं का… ” असं प्रशस्तीपत्रक बहाल करणा-या… म्हणूनच भाजी हा गृहिणींच्या जिव्हाळ्याचा विषय..

आज विविध अॅपद्वारे घरापर्यंत भाजी येते नि फ्रीजमधे ती आठवडाभर साठवलीही जाते.

पण माझ्या बालपणी ना ऐप होते ना फ्रीज… गृहिणींना रोजची भाजी रोज आणावी लागे… टी. व्ही. , इंटरनेट, मोबाईल नसण्याच्या त्या काळात रोज संध्याकाळी बाजारात जाऊन भाजी आणणे, हा एक विरंगुळा होता… रोजची वेगळी भाजी हा जसा खाद्यजीवनातील विरंगुळा तसा भाजी आणायला जाणे हा रोजच्या जीवनातला!!

माझी आईही याला अपवाद नव्हती… चेहरा धुवून, छान साडी नेसून आई पावडर, कुंकु लावायची. कानातलं घालायची… आधीच गोरीपान, निळ्या डोळ्यांची अशी छान दिसणारी माझी आई अजूनच सुरेख दिसायची. आठ-नऊ वर्षांची मी तिचं बोट पकडून तिच्या बरोबर भाजीला जायचे. वाटेत ओळखीच्या बायका भेटायच्या. त्यांच्याबरोबरच्या गप्पा व्हायच्या. मग भाजी खरेदी व्हायची.

भेंडी, दुधी, मुळा, काकडी यांना नख लावून त्यांचं कोवळेपण पारखणे, गोल, पातळ पानांची मेथी कडू नसते, वांगी किडलेली नाही नं ते पाहून कशी घ्यायची.. अशा अनेक गोष्टी मी कोणीही न शिकवता केवळ पाहून शिकले… विविधरंगी ताज्या भाज्यांतून घडणारा निसर्गाचा अविष्कार मला तेंव्हापासून आजतागायत आनंद देतोय..

“कमी पैशांत जास्तीत जास्त खरेदीचा आनंद भाज्या देतात. “. हे सत्य मला खूप लहानपणी समजलं. म्हणूनच कदाचित आजही मला इतर कोणत्याही खरेदीत रस वाटत नाही पण भाजी खरेदी मात्र मनापासून आवडते.

कधी कलिंगडासाठी तर उसाच्या रसासाठी केलेला हट्ट आणि तो पूर्ण झाल्यावर मिळालेला जग जिंकण्याचा आनंद…!! परतीला आईच्या मैत्रिणीच्या घरी जाणं, तिथे प्यालेली कॉफी किंवा सरबत… किंवा त्यांच्या पायरीवर बसून मारलेल्या गप्पा… कधी कधी बाजारात जाताना घरच्या विवंचनेनी वैतागलेल्या आईची कळी परतताना मात्र खुललेली असे!!

गवारी, घेवडा किंवा पालेभाजी निवडणे हा घरातला एक सांस्कृतिक कार्यक्रम असायचा. आई गच्चीत किंवा घराच्या पायरीवर बसून भाजी निवडे. मी, माझी थोरली बहीण घरी असलो तर तिला मदत करायचो. भाजी निवडताना आई तिच्या लहानपणीच्या सुखदु:खाच्या गोष्टी सांगायची.. तिच्या बरोबर तिच्या आठवणींच्या सहलीत आम्हीही सामील व्हायचो… मोठ्या होताना आम्ही भाजी निवडतानाच तिची सुखं दु:खं वाटून घेतली.. नि तिनेही आमची!! .. सुखात आम्ही तिघीही हसलो नि डोळ्यातल्या पाण्याबरोबर दु:खही साजरं केलं!! … कदाचित त्या भाजीने आमच्यातील बंध अजूनच घट्ट केले..

” आज भरलेली वांगी करा “, ” उद्या चाकवताची भाजी करणार नां? ” बाबा हक्काने सांगायचे नि आई आवडीने त्या भाज्या करायची..

कधीतरी आईबाबांचं काहीतरी बिनसलेलं असायचं.. काही दिवस सारं घर शांत असायचं.. दोघांत अबोला.. त्या तणावाने आम्ही मुलेही गप्प गप्प असायचो..

एक दिवस पानात बाबांची आवडती भरल्या वांग्याची भाजी आणि तोंडलीभात दिसायचा … बाबांचं आईकडे पाहून खुदकन् हसणं आमच्या चिमुकल्या नजरांनाही जाणवायचं… आईचा चेहराही प्रसन्न व्हायचा नि अमावस्येचं सावट सरून सारं घर चांदण्याच्या शुभ्र प्रकाशात हसतं खेळतं व्हायचं!!

एकदा आमच्या कारखान्यातल्या पाठीमागच्या भल्यामोठ्या मोकळ्या जागेत भाजी लावायचं आईबाबांच्या डोक्यात आलं. रोज सकाळी बागकाम सुरू झालं.. गवा-या, दुधीभोपळे जोमाने आले.. घरी, दारी, काकांकडे रोज गवा-या नि दुधी जाऊ लागले..

सुरुवातीला सगळा आनंदीआनंद होता.. नंतर मात्र गवारी नि दुधीच्या रोजच्या वासाने जेवणावरची वासना उडू लागली..

 ” चार कानाखाली द्या पण गवारी, दुधी नको ” असे शेजारीपाजारीही म्हणू लागले नि आई बाबांच्या बागकामाच्या आवडीने निरोप घेतला..

भाजी पुराण तर झालं … पण माझी आवडीची भाजी मी तुम्हाला सांगायचं राहूनच गेलं…

मला ” लाल माठाची ” भाजी भयंकर आवडायची.. मी वाटीभर भाजी नुसतीसुद्धा खायचे.. पोळी, भाकरीबरोबर अगदी गरमगरम तूप भातासोबतही मी लाल माठाची भाजी मिटक्या मारत खात असे..

एखादी रविवारची सकाळ असायची.. बाबा कारखान्यात गेलेले असायचे. भाऊ बहीण जादा तासाला किंवा त्यांच्या मित्रमैत्रिणीकडे… मी खोलीत अभ्यास करत बसलेली.. आदले दिवशी गणिताच्या पेपरात बरेच कमी मार्क पडलेले.. आईने अभ्यास घेऊनही… आईने पाठीत घातलेले दोन धपाटे नि धरलेला अबोलाही… जगणंच फोल वाटायला लावणारा… दिवसभर नि रात्रीही डोळ्यातून न थांबणारं पाणी… आई नि माझ्यात पडलेलं हजारो मैलाचं भावनिक अंतर… नि आईचा आलेला हजारो टन राग…

आदले दिवशी रात्रीच्या जेवणावर टाकलेला बहिष्कार… त्यामुळे सकाळी पोटात उसळलेला भुकेचा डोंब..!! .. स्वयंपाकघरातून जाणवणारी आईची चाहूल… हळूच सवयंपाकघरात डोकावणं… आई विळीवर एक पाय वर घेऊन बसलेली… शेजारी स्टीलच्या चाळणीत धुतलेली लालबुंद माठाच्या भाजीची पाने… आईचं ती पाने मुठीत घेऊन विळीवर चिरणं.. चिरण्याचा येणारा चरचर आवाज… आईचे भाजीमुळे लालबुंद झालेले हात… गॅसवर ठेवलेला काळाभोर लोखंडी तवा… त्यात घातलेलं तेल नि पाठोपाठ घातलेला भरपूर लसूण… नि त्यावर घातलेली चिरलेली माठाची भाजी… चर्रर्र… आवाज नि पाठोपाठ उसळलेला स्वर्गीय सुगंध… एका बाजुला पोटातली जबरदस्त भूक नि दुसरीकडे आईवरचा राग..

“हिने मुद्दाम आज माझ्या आवडीची भाजी केलीय पण मी जेवणार नाही “… मनाशी केलेला निश्चय… आईचं खोलीत येणं नि हाताला धरून स्वयंपाकघरात ओढत नेणं! दुस-या तव्यावर टाकलेली भाकरी… आता ताटलीत टम्म फुगलेली गरमागरम भाकरी, त्यावर तूप नि कडेला मला भयानक आवडणारी लाल माठाची भाजी…

आई ताटली घेऊन माझ्याजवळ बसलेली… भाजी लावून भाकरीचा एक घास माझ्या तोंडाजवळ आईने नेलेला… मला भरवण्यासाठी..

” मला नको… मी नाही खाणार “

” असं रागावतात आईवर? आई चांगल्यासाठीच रागावते नं? आता पुढच्यावेळी जास्त अभ्यास करून छान मार्क मिळवायचे.. शहाणं माझं बाळ! आणि माझे हात पाहिले का कसे लाल झालेत.. आणि भाकरी पाहिली का.. माझ्या बांगडीची कशी नक्षी उमटलीय भाकरीवर!! “

आईचे भाजीमुळे रंगलेले हात नि भाकरीवरची तिच्या सोन्याच्या बांगडीची नक्षी पाहिली नि मला हसू आवरेना नि त्याचवेळी डोळे पाझरू लागले… आईला घट्ट मिठी मारली… आईची मऊ साडी ओलीकच्च झाली नि त्याचवेळी माझे केसही…!!

माठाने रंगलेल्या आईचे हात नि भाकरीवर उमटणारी तिच्या सोन्याच्या बांगड्यांची नक्षी आम्हा भावंडांना प्रत्येक वेळी हसवायची… यावेळी मात्र त्यांनी आम्हा दोघी़ंना रडवलं!!

दिवस कसे पळत होते ते कळलच नाही…

एके दिवशी डोक्यावर अक्षता पडल्या नि सासरचा मार्ग धरला… माहेर मागे पडलं.. नव्या आयुष्यात जुन्या गोष्टी दिसेनाशा झाल्या… सासरी रोज स्वयंपाक करायचे पण सोलापुरात ” तांबडा माठ ” मिळत नाही ही गोष्ट लक्षातही आली नाही… प्राधान्यक्रम बदलले होते..

मिरजेला माहेरी गेल्यावर आई विचारायची, ” उद्या लाल माठाची भाजी करू कां गं? “

पण त्या तारुण्याच्या बहरात आईनं केलेल्या लाल माठाच्या भाजीपेक्षा हॉटेलातील लाल रंग घातलेल्या बटर पनीर मसाल्याकडे जीव ओढला जायचा… अशावेळी त्या माऊलीचं अंत:करण नक्कीच दुखावत असणार.. पण तिने ते चेह-यावर कधीच दाखवलं नाही!

काळ पुढे जातच होता… त्याने आईच्या स्वय़ंपाक करणा-या हातांचा वेग कमी केला… आता आई फक्त भाजी निवडण्याचं काम करू शकायची…

… आणि एके दिवशी काळाने तिला पुर्णपणेच थांबवलं… नि तिला अनंताच्या प्रवासाला तो घेऊन गेला…!!

मानवी मन मात्रं अनाकलनीय असतं..

त्याचे हिशोब, त्याचं वर्तन सारं गूढ प्रदेशातलं…!!

आई गेल्यानंतर तिच्या आठवणींनी पिंगा घालायला सुरूवात केली.. ती असताना जी लाल माठाची भाजी मनाच्या पडद्याआड गेली होती… तिची रोज आठवण येऊ लागली…

… म्हणूनच वहिनीकडे फक्त लाल माठाची मागणी केली… वहिनीने आणलेला लाल माठ पाहून जीव सुखाच्या गावातून फिरून आला…

भाऊ वहिनी दुसरे दिवशी सकाळीच परत गेले… त्याच दिवशी लाल माठाची भाजी नि भाकरीचा बेत आखला… स्वयंपाकाच्या मावशींनी मी सांगितल्याप्रमाणे भाजी नि भाकरी केल्या… भाजी चांगलीच लागत होती… भाकरी तर आईच्या भाकरींपेक्षा पातळ होत्या..

 

– – पण… भाजी-भाकरी घशात अडकत होती… कारण लेकराला आनंदाने जेवताना पहाणारी माझ्या माऊलीची ती स्निग्ध नजर आज नव्हती… लाल माठाच्या भाजीमुळे लाल लाल झालेले आईचे गोरेपान हात नव्हते… नि ते पाहून वेड्यासारखं हसत सुटणारी माझी बहीण माझ्यासोबत नव्हती..

… आणि मुख्य म्हणजे पांढ-याशुभ्र भाकरीवर आईच्या सोन्याच्या बांगड्यांची नक्षी उमटलेली नव्हती!

– समाप्त –

© सुश्री नीला महाबळ गोडबोले 

सोलापूर 

फोन नं. 9820206306,  ई-मेल- gauri_gadekar@hotmail. com; gaurigadekar589@gmail. com

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ बाप-माणूस… — भाग – ३ ☆ सुश्री प्रणिता खंडकर ☆

सुश्री प्रणिता प्रशांत खंडकर

? जीवनरंग ❤️

☆ बाप-माणूस… — भाग – ३ ☆ सुश्री प्रणिता खंडकर ☆

(वासंतीकडे तरी कुठून फारसा पैसा असणार? कुटुंबाचा आधार तर बिलकुलच नव्हता. घराचं भाडं, रोजचं दूध, भाजीपाला आणि लहानग्याचं संपूर्ण भविष्यच आ वासून समोर उभं होतं. माझ्या आणि पोलीस स्टेशन मधल्या इतर कर्मचाऱ्यांच्या मदतीने, तिने ते सर्व सोपस्कार पूर्ण केले. सरकारी कामकाज म्हटलं की त्याची कार्यवाही व्हायला वेळ तर लागणारच. या सगळ्यात तीन महिने असेच निघून गेले.) — 

इथून पुढे – – – 

या मधल्या काळात आणखीही काही घटना घडल्या. माझे वडील गुजरातमध्ये फिरतीवर असताना त्यांना हार्ट अ‍ॅटॅक आला. मी सावत्र आईला सोबत घेऊन सुरतला गेलो. औषध उपचारांसोबतच, त्यांच्या हिंडण्या फिरण्यावर काही निर्बंध आले. शिवाय आहाराचं पथ्यही सांभाळणं गरजेचं होतं. मग त्यांनी सुरतमध्ये घर घेऊन राहण्याचं ठरवलं आणि माझी सावत्र आईही तिथेच राहू लागली. त्यांना कंपनीनं गुजरातमध्येच कमी फिरतीचं काम देण्याचं मान्य केलं. मी काॅलेज आणि नोकरीमुळे डहाणूला परत आलो.

विजयराव गेल्यापासून मी माझ्या घरात.. हाॅलमध्ये झोपायचो. आता पूर्ण घरात मी एकटाच होतो. अभ्यास आणि नोकरी सांभाळून, जमेल तशी वासंतीला मदत करत होतो. तिचे पैसे आॅफिस कडून मिळण्यासाठी, पोलीस स्टेशनला, त्यांच्या हेड ऑफिसला, मंत्रालयात अशा अनेक ठिकाणी बऱ्याच फेऱ्या माराव्या लागल्या.

विजयरावांच्या फंडाचे पैसे मिळायलाही खूप

त्रास झाला. कारण नोकरीला लागताना विजयरावांनी जे फाॅर्म भरले त्यात आईच्या नावाचं नाॅमिनेशन होतं. कायदेशीर वारसाची कागदपत्रांची पूर्तता केल्यानंतर वासंती आणि तिच्या सासूला ते पैसे विभागून मिळाले. काही रक्कम खर्चासाठी ठेवून बाकी देशपांडे सरांच्या सल्ल्यानुसार पोस्टाच्या योजनेत गुंतवले, जेणेकरून वासंतीला दरमहा एक ठराविक रक्कम हातात मिळेल.

माझ्या B. Com. फायनल परिक्षेचं वेळापत्रक आलं, तशी मी देशपांडे सरांकडून सुट्टी मागून घेतली. नेटाने अभ्यास करायला हवा होता. मला नाश्ता, जेवण देण्याची जबाबदारी वासंती निभावत होती. मी जास्तीत जास्त वेळ अभ्यासाला देत होतो. अधून मधून वासंतीच्या छोट्याला सांभाळत होतो. एप्रिलच्या तिसऱ्या आठवडय़ात B. Com. ची परीक्षा एकदाची पार पडली. आता जूनमध्ये ICWA ची फायनल होती… तिसऱ्या वर्षाच्या परीक्षेच्या अभ्यासावर लक्ष केंद्रित करायला हवं होतं.

मे च्या तिसर्‍या आठवड्यात वासंतीला अनुकंपा तत्त्वावर नोकरी मिळण्यासाठी मुलाखतीला बोलावण्यात आलं. ठाण्याच्या हेडआॅफिसला त्यासाठी तिला घेऊन गेलो. मग परत एकदा तिच्या कागदपत्रांची पडताळणी म्हणून जावं लागलं. छोट्या लेकराला घेऊन सगळीकडे एकटीनं जाणं अवघडच होतं ना! तिला इतर कोणाचा आधार नसल्याने ती माझीच जबाबदारी झाली होती. त्यानंतर तिला वैद्यकीय तपासणीसाठी ठाण्याच्या सिव्हिल हाॅस्पिटलला बोलावण्यात आलं. आणि वासंतीवर अजून एक बाँम्बगोळा पडला. वैद्यकीय तपासणीत ती गरोदर असल्याचं निष्पन्न झालं. साडेतीन महिने उलटले होते. ही गोष्ट आधी तिच्या लक्षातच आली नव्हती. विजयरावांच्या निधनाने झालेल्या आघातामुळे, तिचं स्वतःच्या तब्येतीकडे लक्षच राहिलं नव्हतं. त्यामुळे तिचे इतर वैद्यकीय अहवालदेखील चांगले नव्हते. लोह आणि इतर जीवनसत्त्वांची कमतरता, वजन आणि उंचीचं प्रमाण इत्यादी गोष्टी योग्य प्रमाणात नव्हत्या. त्यामुळे लगेच नेमणूक होणं शक्य नव्हतं. आता हे सगळं कसं निभावायचं हा फार जटील प्रश्न झाला होता. वासंती खूप निराश झाली होती. तिला डहाणू मधल्या महिला डाॅक्टरकडे घेऊन गेलो. त्यांनी वासंतीला नियमित औषधे, तपासणी आणि आरामाची आवश्यकता असल्याचं सांगितलं.

तिच्या हातात येणाऱ्या मोजक्या पैशांमुळे महिन्याचा खर्च जेमतेम भागत होता. त्यामुळे घरकामाला नोकर ठेवणं परवडणारं नव्हतंच. औषधांचा खर्च करणं तर भागच होतं. गर्भपात करणंही अतिशय जोखमीचं आहे, असं सांगून डाॅक्टरांनी त्याला नकार दिला.

मला मिळणाऱ्या पगारात माझा खर्च कसाबसा भागत होता. जमेल तेवढी मदत मी वासंतीला करत होतो. तिच्या नाजूक तब्येतीमुळे काहीवेळा रात्रीदेखील मला तिच्यासोबत थांबावं लागत होतं. स्त्री-पुरूष नात्याला एकाच दृष्टीने बघणाऱ्या आजूबाजूच्या लोकांमध्ये यावरूनही कुजबुज सुरू होती. मारणाऱ्याचा हात धरता येतो, पण बोलणाऱ्यांची तोंड कसं धरणार? आम्ही दोघेही यामुळे दुःखी होत होतो. या सर्व तणावपूर्ण वातावरणातच माझी ICWA ची अंतिम परीक्षा पार पडली.

जुलै महिन्याच्या दुसऱ्या आठवडय़ात माझा B. Com. चा रिझल्ट लागला. मी फर्स्ट क्लासने पास झालो. तिसऱ्याच आठवड्यात मला जे. अँड एम. इलेक्ट्रॉनिक्स कंपनीकडून मुलाखतीसाठी बोलावणं आलं. मी नोकरीसाठी अनेक ठिकाणी अर्ज करत होतो. त्यापैकी ही खूप मोठी कंपनी होती. त्यांच्या भारतभर अनेक शाखा होत्याच शिवाय काही शाखा परदेशातही होत्या. त्यांनी अकाउंटंटच्या पदासाठी मुलाखतीसाठी बोलावलं होतं. त्यानंतर मला नरिमन पाॅइंटच्या मुख्य आॅफिसात दोन तीन वेळा जावं लागलं… प्रमाणपत्र पडताळणी, वैद्यकीय तपासणी इत्यादी साठी. या साऱ्यात एक महिना कुठे गेला ते कळलंच नाही. आॅगस्टच्या तिसऱ्या आठवडय़ात मला कंपनीकडून नेमणुकीचं पत्र आलं. मला प्राथमिक प्रशिक्षणासाठी एक महिना दिल्लीला जावं लागणार होतं, त्यानंतर प्रत्यक्ष कार्यालयात नेमणूक होणार होती.

इकडे आड तिकडे विहीर अशी माझी अवस्था झाली. वासंतीची परिस्थिती नाजूक होती. तिला एकटीला असं सोडून दिल्लीला जाणं मला अवघड वाटत होतं. पण नोकरीची एवढी चांगली संधी गमावणंदेखील शक्य नव्हतं. अखेर देशपांडे सरांकडे घरकाम करणाऱ्या मावशींच्या ओळखीने एक बाई मिळाली. ती विनापाश विधवा वासंतीकडे राहून तिची काळजी घ्यायला तयार झाली.

या एक महिन्यात वासंतीच्या मुलानं तिला खूपच त्रास दिला. त्याला माझी सवय झाली होती. मी घरात न दिसल्याने तो सारखा रडारड, चिडचिड करून वासंतीच्या मागे लागत होता.

माझं ट्रेनिंग संपण्याच्या आदल्या दिवशीच माझी नेमणूक भोपाळच्या आॅफिसला झाल्याचं पत्र मला मिळालं. एक आॅक्टोबरला म्हणजे तीनच दिवसानंतर मला भोपाळच्या कार्यालयात हजर व्हायचं होतं. कंपनीतर्फे तिथे मला राहायला जागा मिळणार होती.

मी दिल्लीहून डहाणूला आलो. भोपाळला राहण्याच्या दृष्टीने काही सामानही न्यायचं होतं. मी भोपाळला जाणार या कल्पनेनं वासंती कासावीस झाली.

वासंतीला आणि मलाही एकमेकांची सवय झाली होती. त्यामुळे असं वेगळं राहणं दोघांनाही त्रासदायक वाटत होतं. दोघांनाही जीवाभावाचं असं कोणीच नव्हतं. वासंतीचा मुलगा तर मला एक क्षणही एकटं सोडत नव्हता. मलाही त्याचा लळा लागला होताच. मी त्या दोघांना माझ्यासोबत भोपाळला घेऊन जायचं ठरवलं. पुढील आयुष्यातील गुंतागुंत टाळण्यासाठी आम्ही लग्न करण्याचा निर्णय घेतला आणि तशी सूचना विवाह-निबंधक कार्यालयात दिली. मी माझ्या वडिलांनाही फोन करून कळवलं. पण त्यांना हे अजिबात आवडलं नाही आणि यापुढे आपला संबंध संपला, असं म्हणून त्यांनी फोन ठेवून दिला.

मी भोपाळला कामावर रूजू झालो. एक महिन्यानंतर नोंदणी पद्धतीने आमचं लग्न झालं. मग पुढच्या आठवड्यात सर्व सामान बांधून आम्ही भोपाळच्या घरात राहायला गेलो. वासंतीची काळजी घेणाऱ्या मावशी मात्र आमच्यासोबत आल्या. त्या मग आपल्या घरातल्याच झाल्या. त्यांचे उपकार आजन्म फिटणार नाहीत.

नोव्हेंबरच्या दुसर्‍या आठवड्यात वरदाचा जन्म झाला. वडील म्हणून तिच्या जन्म दाखल्यावर माझंच नाव लावायचा निर्णय आम्ही घेतला होता. त्यानंतर दोघांत भावंडांच्या नावात फरक असल्याने कोणतीही भावनिक आणि कायदेविषयक समस्या निर्माण होऊ नये, म्हणून मोठ्या मुलाला, म्हणजे तुला, मी दत्तक घेण्याची प्रक्रिया आम्ही पूर्ण केली. मनाने तर ते नातं आधीच स्वीकारलं होतं. त्यामुळे दत्तक विधानातील अट असली तरी या दत्तक प्रकाराचा उच्चार न करण्याचं आम्ही ठरवलं होतं आणि तशी कधी गरजही वाटली नाही.

सावत्रपणाचा कटू अनुभव मी घेतला होता, तो तुम्हां दोघां भावंडांच्या वाट्याला कधीही येऊ नये ही मनोमन इच्छा होती माझी!

तुझा आय. पी. एस. चा रिझल्ट लागला आणि वासंती पुन्हा भूतकाळात गेली. त्या सर्व दुःखद घटनांची मनात उजळणी झाली आणि त्या तणावामुळेच तिचा रक्तदाब एकदम कमी झाला आणि तिला अ‍ॅडमिट करायची वेळ आली.

विराजचे डोळे पाण्याने तुडुंब भरले होते आणि त्यानी श्रीधरला घट्ट मिठी मारली. या बाप-माणसाबद्दल प्रेम, आदर, कृतज्ञता अशा अनेक भावना त्याच्या मनात उचंबळून आल्या होत्या.

– समाप्त – 

© सुश्री प्रणिता खंडकर

संपर्क – सध्या वास्तव्य… डोंबिवली, जि. ठाणे.

ईमेल pranitakhandkar@gmail.com केवळ वाॅटसप संपर्क.. 98334 79845.

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ बाप-माणूस… — भाग – २ ☆ सुश्री प्रणिता खंडकर ☆

सुश्री प्रणिता प्रशांत खंडकर

? जीवनरंग ❤️

☆ बाप-माणूस… — भाग – २ ☆ सुश्री प्रणिता खंडकर ☆

(त्यांचा तो छोटासा व्हरांडा व्यवस्थित बंद करून घेतलेला होता. तिथे त्यांनी एक सेटी ठेवलेली होती. वडिलांच्या परवानगीने मी रात्री तिथे अभ्यासाला बसू लागलो. माझ्या सावत्र आईला माझ्याशी काही देणं घेणं नव्हतंच.) 

इथून पुढे – – 

अभ्यास करता करता मी काही वेळा तिथेच झोपून जायचो. त्यांचा छोटा मुलगा कधी रात्री रडत असला, झोपत नसला तर त्याला खेळवायचो. रोजच्या सहवासाने तोही माझ्याकडे छान राहायचा. त्यामुळे वासंतीला ही जरा मोकळीक मिळायची. दिवसभर ती घरकाम आणि त्या छोट्याला सांभाळताना थकून जायची. विजयची विधवा आई गावाकडे त्याच्या भावासोबत राहायची. क्वचित कधीतरी ४-५ दिवस विजयकडे राहायला यायची. विजय आणि वासंतीला प्रेमविवाह दोन्हीकडच्या घरी मान्य नव्हता. त्यामुळे जवळचे नातेवाईकांचं येणं-जाणं असं नव्हतं च! विजयची पोलीस खात्यात नेमणूक झाली, तेव्हा वासंती सिनियर काॅलेजच्या पहिल्या वर्षात शिकत होती. (एफ. वाय. बी. ए.). घरच्यांनी तिचं लग्न दुसरीकडे जमवण्याचा प्रयत्न सुरू केला. म्हणून मग वासंतीला अठरा वर्षे पूर्ण होताच या दोघांनी गुपचूप रजिस्टर लग्न केलं. एक वर्षानंतर मुलाचा जन्म झाला. त्यामुळे वासंतीचं शिक्षण अर्धवटच राहिलं.

नियमित अभ्यास केल्यामुळे मला बारावीत अठ्ठ्याहत्तर टक्के गुण मिळाले. मी बी. काॅम. बरोबरच ICWA ला पण अ‍ॅडमिशन घेतली. डहाणूतील अरविंद देशपांडे यांच्या सी. ए. फर्ममध्ये मी नोकरी पण मिळवली. ते बाबांच्या परिचयाचे होते, त्यामुळे मला अभ्यास, परिक्षा सांभाळून, आॅफिसचं काम करायला सवलत द्यायचे.

इकडे विजयरावही खूप धडाडीने काम करत होते. आजूबाजूच्या परिसरातील गुंडांना त्यांनी चांगलाच चाप लावला होता. एकदा त्यांच्या बदलीची आॅर्डर आली, तरी लोकांनी ती रद्द करायला लावली. त्याऐवजी मग फक्त त्यांची डहाणू तालुक्यातल्या दुसर्‍या पोलीस ठाण्यात बदली करण्यात आली. एकंदरीत सगळं सुरळीत चालू होतं.

फेब्रुवारीचा महिना होता. माझी फायनल इयरची परीक्षा जवळ आली होती. त्यामुळे मी पण जास्तीत जास्त वेळ अभ्यासात घालवत होतो. खाण्या-पिण्याची देखील शुद्ध नसायची. वासंती जबरदस्तीने मला कधी चहा-नाश्ता तर कधी जेवण घ्यायला लावायची. माझ्या सावत्र आईला माझं काही सोयर-सुतक नव्हतंच. वडील बाहेर दौऱ्यावर असतील तेव्हा ती आपल्या मैत्रिणींना घरी बोलावून मजा करत असायची नाहीतर त्यांच्यासमवेत बाहेर भटकत असायची.

त्या दिवशी देखील मी रात्री उशिरापर्यंत वाचत बसलो होतो. आणि रात्री एक वाजता अचानक कोणीतरी दार ठोठावलं. मी भांबावून गेलो. तेवढ्यात तोआवाज ऐकून बाजूच्या घरातून माझे वडील बाहेर आले. ते नेमके त्या दिवशी घरी होते. मग मीदेखील दार उघडून बाहेर डोकावलो. एव्हाना वासंती देखील जागी होऊन व्हरांड्यात आली होती.

एक पोलीस वडिलांना हळूहळू काहीतरी सांगत होता. ते दोघेही गंभीरपणे वारंवार विजयच्या घराकडे बघत होते.

मी दार उघडलेलं पाहून वडील आणि तो पोलीस तिकडे आले. वडील मग वासंतीला म्हणाले की, विजयरावांना अपघात झाला आहे आणि ते गंभीर जखमी झाले आहेत. तुमच्या घरच्या कोणाचा फोन नंबर असेल तर द्या. हे ऐकून वासंतीला एकदम भोवळच आली. बाळ झोपलेलं होतं. मी पटकन पाणी आणलं आणि वासंतीला शुद्धीवर आणण्याचा प्रयत्न करू लागलो. तोवर माझी आईदेखील तिथे येऊन वासंती जवळ बसली. वडिलांनी शेजारच्या वाड्यातल्या कोणाला तरी डाॅक्टरला बोलवायला पाठवले.

मला एकदम आठवलं की विजयरावांची डायरी घरात टेबलच्या ड्राॅवरमध्ये असते. मी डायरी चाळून बघितली, शेवटच्या पानावर त्यांच्या भावाचं नाव आणि एक फोननंबर लिहिलेला होता. तो मी वडिलांना दाखवला.

वडील मग त्या पोलीसासोबत हाॅस्पिटलमध्ये गेले. सारं काही संपलं होतं. विजयरावांचा बाईकला ट्रकची धडक बसल्याने, ते जागेवरच गेले होते. वासंतीला हे कसं सांगायचं हा मोठाच प्रश्न होता.

मी दिलेल्या नंबर वर फोन करून विजयच्या भावाला निरोप दिला गेला. तो फोननंबर गावातल्या – पोलीस स्टेशनचा होता. तेव्हा घरोघरी फोन आलेले नव्हते. मग तिथल्या पोलिसांच्या मदतीने एक जीप मिळवून विजयची आई, भाऊ-भावजय आणि काही गाववाले पहाटे डहाणूला पोचले. वासंतीची आई, भाऊ-वहिनी देखील सकाळी येऊन पोचले.

आल्या आल्या विजयच्या आईने हंबरडा फोडला आणि वासंतीच्या नावाने शिमगा मांडला. हिच्यामुळे माझा मुलगा गेला. तिनंच त्याला माझ्यापासून तोडलं आणि आता कायमचा दूर गेला. त्या तश्या प्रसंगीदेखील या दोन परिवारात तूतू मैमै सुरू होती. या सर्व हल्ल्यामुळे, डाॅक्टरांनी इंजेक्शन दिल्याने जरा शुद्धीवर येत असलेल्या वासंतीची दातखिळीच बसली. डाॅक्टर तिथेच थांबले होते म्हणून बरं! त्यांनी लगेच उपचार केले आणि नंतर मात्र तिला शांत झोपवून ठेवण्यासाठी एक गोळी देऊन गेले.

या प्रसंगाला कसं तोंड द्यावं हे मलाही समजत नव्हतं. विजयच्या घरच्यांनी बाकीचे सगळे सोपस्कार पार पाडले. मी फक्त त्या छोट्याला सांभाळत होतो. कारण माझी सवय असल्याने तो फक्त माझ्याकडेच शांत राहात होता. आपल्या आईला काहीतरी झालंय एवढंच त्या छोट्या जीवाला कळत होतं.

विजयरावांचा अंत्यसंस्कार आटोपल्यावर वासंतीच्या माहेरचे लोक निघून गेले. लोकलाजेस्तव फक्त सासू आणि दीर-जाऊ तेवढी राहिली होती. दिवसकार्य आटोपल्यावर तेही निघून गेले. जाताना दीर अंत्यसंस्कारासाठी आणि दिवसकार्यासाठी खर्च केलेले पैसे मागून घ्यायला विसरला नाही. त्या दहा दिवसांतही सासूच्या तोंडाचा पट्टा अखंड चालू होता, वासंतीला शिव्या घालण्यासाठी! आधी प्रेम नव्हतेच, पण आता विजय गेल्यावर त्याच्या बायको-मुलाशी तर त्यांना काहीच संपर्कही ठेवायचा नव्हता, मग जबाबदारी घेण्याचा तर प्रश्नच उद्भवत नाही.

एवढ्या भयंकर आघाताने वासंती पार कोलमडून गेली होती. शेजारधर्म म्हणून माझी सावत्र आई मात्र तिला दोन घास जबरदस्तीने खायला घालत होती. वासंतीची अवस्था फारच वाईट झाली होती. आपल्या मुलाला कवटाळून ती वारंवार हंबरडा फोडून रडायची आणि तिची शुद्ध हरपायची. मला अभ्यास सुचणं शक्यच नव्हतं. मी त्या छोट्याला घेऊन आत-बाहेर करत राहायचो आणि त्याला भात-खिचडी असं खाऊ घालायचो.

साधारण महिनाभरानंतर वासंती थोडीशी सावरली. आपल्या मुलाला आपणच जेवू-खाऊ घातलं पाहिजे, याची तिला जाणीव झाली. मग ती काहीतरी अन्न रोज शिजवू लागली. पोलीसस्टेशनमधून एक हवालदार काही कागदपत्रं देऊन गेले होते. नोकरीत कामावर असताना विजयरावांचा मृत्यू झाल्यामुळे नियमानुसार जे काही पैसे त्यांच्या कुटुंबाला मिळायला हवे, त्यासाठीचे अर्ज त्यात होते. शिवाय अनुकंपा तत्त्वावर वासंतीला पोलीस खात्यात नोकरी मिळण्यासाठीचा अर्जही त्यात होता.

मरणारा तर निघून जातो, पण मागे राहिलेल्याला जगण्यासाठी सर्व धडपड करावीच लागते. पैशाचं सोंग तर आणता येत नाहीना! वासंतीकडे तरी कुठून फारसा पैसा असणार? कुटुंबाचा आधार तर बिलकुलच नव्हता. घराचं भाडं, रोजचं दूध, भाजीपाला आणि लहानग्याचं संपूर्ण भविष्यच आ वासून समोर उभं होतं. माझ्या आणि पोलीस स्टेशन मधल्या इतर कर्मचाऱ्यांच्या मदतीने, तिने ते सर्व सोपस्कार पूर्ण केले. सरकारी कामकाज म्हटलं की त्याची कार्यवाही व्हायला वेळ तर लागणारच. या सगळ्यात तीन महिने असेच निघून गेले.

– क्रमशः भाग दुसरा 

© सुश्री प्रणिता खंडकर

संपर्क – सध्या वास्तव्य… डोंबिवली, जि. ठाणे.

ईमेल pranitakhandkar@gmail.com केवळ वाॅटसप संपर्क.. 98334 79845.

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ बाप-माणूस… — भाग – १ ☆ सुश्री प्रणिता खंडकर ☆

सुश्री प्रणिता प्रशांत खंडकर

? जीवनरंग ❤️

☆ बाप-माणूस… — भाग – १ ☆ सुश्री प्रणिता खंडकर ☆

विराज त्याच्या सर्टिफिकेटसची फाईल घ्यायला घरी आला होता. ती त्याला स्कॅन करून मेलनी

नाशिकच्या ऑफिसला लगेच पाठवायची होती.

आजपर्यंत कधी त्याला स्वतःला फाईल कढून घ्यायला लागली नव्हती. काही हवं असलं तर बाबाच काढून द्यायचे त्यांच्या खणातून.

पण यावेळी बाबा घरी नव्हते, मग काय करणार?

त्याचं असं झालं की विराज यू. पी. एस. सी. ची परीक्षा पास झाला होता. चार दिवसांपूर्वी त्याचा रिझल्ट लागला आणि नेमकी त्याच दिवशी त्याच्या आईची तब्येत बिघडली. तिचं ब्लडप्रेशर एकदम खाली आलं आणि चक्कर येऊन ती बेशुद्ध पडली. शेजारच्या काकूंनी ऑफिसमध्ये फोन करून बाबांना बोलावून घेतलं. ते तिला डॉक्टरांकडे घेऊन गेले. पण त्यांनी आईला इस्पितळात दाखल करून घेतलं. त्यामुळे बाबा

सुट्टी घेऊन तिच्याजवळ थांबत होते. विराजही येऊन -जाऊन चौकशी करत होताच. पण त्याला दोन दिवसांनी नाशिकला इंटरव्ह्यूला जायचं होतं, आय. पी. एस. च्या पोस्टसाठी. त्या तयारीच्या गडबडीत असल्याने त्याला जास्त वेळ आईजवळ थांबता येत नव्हतं आणि बाबांनीही त्याला ती मोकळीक दिली होती.

त्याची धाकटी बहीण वरदा बी. काॅम. च्या शेवटच्या वर्षाला होती. तिची परीक्षा चालू होती. त्यामुळे ती देखील

आईजवळ जास्त वेळ थांबू शकत नव्हती. ती क्लास, अभ्यास आणि परीक्षा यातच गुंतलेली होती.

बाबांनी सांगितल्याप्रमाणे त्यांच्या खणात फाईल मिळाली. विराज त्याला पाठवायला लागणारी सगळी सर्टिफिकेट आहेत ना हे तपासून बघत होता. पण त्याला त्याचा शाळा सोडल्याचा दाखला त्यात दिसत नव्हता. मग तो खणात खाली पडलाआहे का म्हणून शोधू लागला. तेव्हा खणात सर्वात खाली एक फाईल दिसली ती पण त्याने उघडली आणि त्यातील कागदपत्रे पाहून त्याला खूप मोठा धक्का बसला. त्याचं डोकं गरगरायला लागलं. तो डोकं धरून खाली बसला. तेवढ्यात…

तेवढ्यात लॅच उघडल्याचा आवाज आला. त्याचे बाबा

आले होते. विराज, मिळाली ना सगळी कागदपत्रं? असं विचारत ते बेडरूममध्ये आले. विराज चटकन सावरून बसला आणि म्हणाला, बाबा, तुम्ही आत्ता कसे काय घरी आलात? ‘अरे, सी विंग मधल्या जोशी काकू आईला भेटायला आल्या होत्या, त्या म्हणाल्या मी संध्याकाळपर्यंत थांबण्याच्या तयारीने आलेय. तुम्हाला हवं तर घरी जाऊन या. म्हणून मी आलो, म्हटलं तुला कागदपत्रं व्यवस्थित लावायला आणि इतरही काही काम असलं तर मदत होईल. मी चहा करणार आहे, तू घेणार आहेस का?

विराजनी त्यांना होकार दिला. एक तर डोकं गरगरत असल्याने ते जागेवर आणायला त्याला चहाची गरज होतीच. शिवाय या विषयावर बाबांशी बोलायला,

शब्दांची जुळवा-जुळव करायला त्याला थोडा वेळ मिळाला असता. असं काय बरं होतं त्या फाईल मध्ये?

बाबांनी चहा केला आणि दोन्ही कप घेऊन ते विराजकडे आले. चहा पिताना विराज विचारमग्न झाला होता. त्याला इंटरव्ह्यूचं टेंशन आलंय असं बाबांना वाटलं. त्यांनी चहा पिऊन कप बाजूला टिपाॅयवर ठेवला आणि त्याच्या खांद्यावर हात ठेवत म्हणाले, काय झालं रे बेटा?

विराजच्या डोळे भरून आले, त्याने ती फाईल बाबांकडे देत विचारलं, हे काय आहे बाबा?

त्या फाईलमध्ये एक ॲफिडेविट होतं आणि विराजचा जन्म दाखला. जन्म तारीख आणि आईचं नाव.. वासंती तेही बरोबर होतं. पण वडिलांचं नाव विजय पवार? त्याच्या बाबांचं नाव तर श्रीधर अभ्यंकर होतं. त्या ॲफिडेविटमध्ये श्रीधर अभ्यंकर यांनी विराजला दत्तक घेतल्याचं म्हटलं होतं. आईचे नाव पूर्वाश्रमीच्या वासंती पवार आणि आताची वासंती श्रीधर अभ्यंकर, असा उल्लेख होता. विराजला आजवर यातलं काहीच माहीत नव्हतं.

बाबा जरासे गंभीर झाले. ‘बाळा, तुला हे कधीच कळू नये अशीच तुझ्या आईची आणि माझी इच्छा होती. पण हरकत नाही. आता तू मोठा आहेस, तुला मी सारं काही थोडक्यात सांगतो. जा, आधी तोंड धुवून जरा फ्रेश होऊन ये आणि तुझी फाईल व्यवस्थित ठेव. हे बघ, शाळा सोडल्याचा दाखला पण आहे तुझ्या याच फाईलमध्ये, दहावीच्या मार्कलिस्टच्या खाली!

विराज परत आला आणि बाबा सांगू लागले.

माझा जन्म डहाणूचा. माझे बाबा एका औषध कंपनीत मार्केटिंग ऑफिसर होते. त्यांना कामानिमित्त महाराष्ट्र आणि गुजरातमध्ये नेहमी फिरावं लागे. माझी आई गृहिणी होती. मला भावंडं नव्हतं. शाळेत पहिल्या तीनात माझा नंबर असायचा आणि मार्क ऐंशी टक्क्यांहून अधिक. आमचं घर मोठं पाच खोल्यांचं होतं. मला अभ्यासाला स्वतंत्र खोली होती. पण मी सातवीत असताना माझ्या आईला न्यूमोनिया झाला आणि त्यातच ती देवाघरी गेली. मी सैरभैर झालो. माझं अभ्यासात लक्ष लागेना. त्यावर्षी जेमतेम पास झालो. आईचे बाबा संधिवाताने अंथरूणाला खिळलेले, त्यामुळे आजीला त्यांच्यासोबत मनमाडला राहणं आवश्यक होतं. एकुलत्या एक लेकीच्या अकाली मृत्यूने ती दोघं आणखीनच खचली होती. बाबांचे आई-वडील कोकणात एका खेड्यात राहातं होते. तिथली नारळ -सुपारीची बाग आणि घर सोडून, कायमचं डहाणूला येणं त्यांना शक्य नव्हतं. तरीही तीन -चार महिने ते माझ्यासाठी येऊन राहिले.

सहा महिन्यानंतर मात्र त्यांनी बाबांनी दुसरं लग्न करावं, असा धोशा लावला. आईच्या वर्षश्राद्धानंतर बाबांनी दुसरं लग्न केलं आणि माझ्या नशिबी सावत्र आईचा जाच आला. तिला स्वैपाक, घरकाम यात बिलकुल रूची नव्हती. ती स्वतःपुरतं काहीतरी बनवून खायची. बाबा फिरतीवर असायचे आणि अनेकदा मला उपाशीपोटी झोपायला लागायचं. बाबा घरी असले म्हणजे निदान जेवायला मिळायचं. बाबांना सांगायला गेलं तर याचे खूप नखरे आहेत खाण्यापिण्याचे, असा कांगावा करून ती तमाशा करायची. म्हणून मी त्यांना सांगणंच सोडून दिलं. शाळेत अनेकदा मी मित्राच्या डब्यातलं खायचो. घरात असलो तर ती काही ना काही काम करायला लावून मला त्रास देत असे आणि तिचं टीव्ही बघणं, लोळत फिल्मी मासिकं वाचणं चालू असे.

दहावीला मला जेमतेम बासष्ट टक्के मिळाले आणि मी डहाणूच्या काॅमर्स काॅलेजमध्ये ॲडमिशन घेतली. घरातलं वातावरण असं असल्याने मी शक्यतो काॅलेजच्या लायब्ररीतच अभ्यास करत बसायचो किंवा मग मित्रांबरोबर बाहेर वेळ काढायचो आणि संध्याकाळी उशिरा घरी यायचो. याचा परिणाम असा झाला की, माझी खोली आणि तिला जोडून असलेली दुसरी खोली भाड्याने द्यायला तिनं बाबांच्या गळी उतरवलं. म्हणजे माझ्याच काॅलेजच्या खर्चासाठी पैसे मिळतील, असं तिचं म्हणणं.

त्याचवेळी विजय पवार नावाचे सबइन्स्पेक्टर बदलीमुळे डहाणूला आले. त्यांना भाड्याने घर हवं होतं.

मग ते त्यांची बायको वासंती आणि सहा महिन्यांचा छोटा मुलगा असे त्या घरात राहायला आले विजयराव त्यांच्या कामाच्या स्वरूपामुळे बराच वेळ बाहेरच असायचे. कधी रात्री-बेरात्री उशिरा घरी यायचे.

आता माझी सावत्र आई रात्री उशिरापर्यंत हाॅलमध्ये टी. व्ही. बघत बसलेली असायची आणि बेडरूम तर आई-बाबांची, त्यामुळे मला घरात अभ्यास करायला जागाच राहिली नव्हती. स्वैपाकघर तसं लहान होतं आणि या आईचं कामात धड लक्ष नसल्याने ते फारसं स्वच्छही नसायचं. मग मी बऱ्याचदा मागच्या व्हरांड्यात खुर्ची आणि स्टूल घालून अभ्यास करत बसायचो. विजयरावांनी ते बघितलं होतं आणि माझी कुचंबणाही त्यांच्या लक्षात आली. मग त्यांनी एक दिवस मला विचारलं की ‘ तू रोज रात्री आमच्या बाहेरच्या व्हरांड्यात अभ्यासाला बसशील का? म्हणजे वासंतीला पण सोबत होईल. मला माझ्या ड्यूटीमुळे अनेकदा रात्री घरी यायला मिळत नाही ना! ‘ 

त्यांचा तो छोटासा व्हरांडा व्यवस्थित बंद करून घेतलेला होता. तिथे त्यांनी एक सेटी ठेवलेली होती. वडिलांच्या परवानगीने मी रात्री तिथे अभ्यासाला बसू लागलो. माझ्या सावत्र आईला माझ्याशी काही देणं घेणं नव्हतंच.

– क्रमशः भाग पहिला 

© सुश्री प्रणिता खंडकर

संपर्क – सध्या वास्तव्य… डोंबिवली, जि. ठाणे.

ईमेल pranitakhandkar@gmail.com केवळ वाॅटसप संपर्क.. 98334 79845.

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ आधुनिक कर्ण आणि जपलेला आत्मसन्मान… ☆ श्री मकरंद पिंपुटकर ☆

श्री मकरंद पिंपुटकर

? जीवनरंग ❤️

☆ आधुनिक कर्ण आणि जपलेला आत्मसन्मान… ☆ श्री मकरंद पिंपुटकर ☆

मी डी मार्टमध्ये नोकरीला आहे, बहुतेक वेळा मी कॅश काऊंटरवर असते. इतर किराणा दुकानांपेक्षा आणि अन्य मॉलपेक्षा आमच्याकडे वस्तूंच्या किंमती खूपच कमी असल्याने आमच्याकडे नेहमीच खूप गर्दी असते.

आज दुपारी चारच्या सुमारासही तशीच परिस्थिती होती. माझ्यासमोर आमच्याच चाळीतील कुसुम तिनं घेतलेलं सामान माझ्या काऊंटरवर ठेवत होती.

कुसुम घरकाम करायची, नवरा दारूडा होता, लिव्हर खराब होऊन मेला गेल्या वर्षी. घरी सासू, एक बालवाडीत जाणारं मूल आणि एक दोन वर्षांचं बाळ – आणि या सगळ्यांचा गाडा एकटी कुसुम ओढत होती.

आजसुद्धा तिच्या खरेदीत निरमा साबण पावडर, आंघोळीचे साबण, तिखट – मीठ, तांदळाच्या कण्या आणि अशाच अगदी आवश्यक वस्तू होत्या, नाही म्हणायला दोन रुपयांचे एक लॉलीपॉप घेतलं होतं तिनं – तिच्या त्या बास्केटमध्ये बिनजरुरी असा एकच काय तो आयटम होता.

मी सराईतपणे पटापट वस्तूंची नोंद केली, अशा वस्तू होत्याच किती म्हणा! आणि बिल झालं ५३९ रुपये.

“अरं माझ्या कर्मा! पाचशेच्या वर बिल झालं! आता काय कमी करू मी?  माज्यापाशीतर पाचशेचीच येक नोट हाय.”

ती मला फारशी ओळखत नसली, तरी मी तिला चांगले ओळखत होती. बहुतेक वेळी बसचे दहा रुपये वाचावेत म्हणून मैलोनमैल पायपीट करत जायची ती, शेअर रिक्षाचासुद्धा कधी तिनं विचार केला नाही.

या जास्तीच्या ३९ रुपयांचं उत्तर तिच्याकडे नसणार, ठाऊक होतं मला. मी केली असती मदत, पण आमचीही महिनाअखेर होती, एकादशीच्या घरी महाशिवरात्र.

मी माझ्या सुपरवायझरकडे शब्द टाकणार, एवढ्यात रांगेत कुसुमच्या मागे उभी असलेली बाई खाली वाकली. कुसुमचं बोलणं रांगेतल्या सगळ्यांनीच ऐकलं होतं, या बाईनं ऐकलं असणारच.

जमिनीवर पडलेली दोनशे रुपयांची एक नोट उचलून कुसुमला देत ती म्हणाली, “ताई, तुम्ही मगाशी तुमची पर्स उघडलीत, तेव्हा तुमच्या पर्समधून ही नोट पडली, घ्या. “

काय चाललं होतं माझ्या लक्षात आलं. त्या बाईला कुसुमला मदत करायची होती, पण तिला ओशाळं वाटू द्यायचं नव्हतं.

“न्हायी वो, माज्यापाशी न्हवती दोनशेची नोट, ” कुसुम प्रामाणिकपणे सांगत होती.

त्या बाईने मदतीच्या अपेक्षेने माझ्याकडे पाहिलं, मी मान डोलावली, कुसुमला म्हटलं, “बाई, तुमच्याच पर्समधून पडली ती दोनशेची नोट. “

गोंधळलेल्या कुसुमने तिची पाचशेची आणि ही दोनशेची अशा दोन नोटा मला दिल्या, मी तिचं सामान आणि उरलेले पैसे तिला परत केले.

तिच्या मागे रांगेत उभ्या असलेल्या त्या बाईला कुसुमला पैसे देऊ करणं शक्य होतं, पण या आधुनिक कर्णानं कुसुमला दानही दिलं, आणि तिच्या आत्मसन्मानाला ठेचही लागू दिली नाही.

देव त्या माऊलीचं भलं करो!

 श्री मकरंद पिंपुटकर 

चिंचवड, पुणे.  मो 8698053215

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ वाणवसा… लेखिका : सुश्री नीता र. कुलकर्णी ☆ सौ अंजली दिलीप गोखले ☆

सौ अंजली दिलीप गोखले

🔆 जीवनरंग 🔆

☆ वाणवसा… लेखिका : सुश्री नीता र. कुलकर्णी ☆ सौ अंजली दिलीप गोखले

वाणवसा…

संक्रांतीच्या सणाची अगदी धामधूम चालली होती. नव्या नव्या भारी साड्या नेसून सगळ्या बायका संक्रान्तिचे खण/सुगडं घेउन इकडे तिकडे जात होत्या. दुकाना-दुकानातून संक्रांतीला लुटण्यासाठी लहान मोठ्या वस्तू घेण्यासाठी अगदी झुंबड उडाली होती.

इकडे साठे वकिलीणबाई आणि घोडके डॉक्टरिणबाईंची चर्चा अगदी मोठ्या रंगात आली होती. चर्चेचा विषय होता संक्रांतीचे हळदीकुंकू. किती बायका बोलवायच्या, काय लुटायचे, पैठणी की शालू नेसायचा वगैरे वगैरे फारच महत्वाच्या विषयावर त्या बोलत होत्या. त्यातच मग गोरे इंजिनिअरिण बाई आणि स्वत:ला साहेबिण बाई म्हणविणाऱ्या ४-५ उच्चभ्ऱू बायका सुध्दा सामिल झाल्या त्यात त्यात सकाळी वाणवसा करायला कोण कोण आले होते याचाही उहापोह झाला. सर्वजणी मी संक्रातिचे सुगडं किती मोठं आणि महागातलं महाग घेतलं हे सांगू लागली. त्यातच त्या कॉलनीत सर्वांच्या कडे मोलकरणीची काम करणारी सीताबाई आज नेमकी सणाच्या दिवशीच आली नाही म्हणून तिच्यावर तोंडसूख घेण्यात आले. ” मेली नवऱ्याच्या आजारपणाचे निमित्त करून हल्ली फारच दांड्या मारते ” असा शेराही मारला गेला. त्यात ओघानेच विषय मालती बाईंचाही निघाला. साठे बाई म्हणाल्या ” स्वत:ला फारच शहाणी समजते ही मालतीबाई. आज वाणवसा करायला का आली नाही म्हणे तर सासूबाईंची तब्येत बरी नाही आणि नवऱ्याला सकाळी लवकर जायचंय म्हणून डबा करायचाय म्हणून येणे जमले नाही ”

मालतीबाई म्हणजे त्या हाय- फाय कॉलनीत चूकून रहायला आलेली मध्यम वर्गीय फॅमिली. मालतीबाईंचा नवरा माधव देशपांडे कचेरीत नूसता क्लार्कच आहे म्हणून तिच्या माघारी सर्वजणी तिला कमी लेखत असत. मालतीबाईच्या सासऱ्याने आपली रिटायरमेंट नंतरची सगळी पूंजी घालून हे मोठ्या नि या पॉश कॉलनीत घर घेतले होते. ही फॅमिली जरी या पॉश कॉलनीत रहायला आली असली तरी बाकीच्या खर्चासाठी ती माणसे आपले अंथरूण पाहून पाय पसरणारी होती. बाकिच्या उच्चभ्ऱू बायकांचे नखरे मालतीला परवडण्यासारखे नव्हते. म्हणून ती त्या बायकात जास्त मिसळत नव्हती. त्यामूळे दूपारच्या वेळी ती लहान मुलांच्या शिकवण्या करुन महिन्याला १-२ हजार रुपये कमावत होती. तेव्हढाच संसाराला हातभार. त्यामूळे मालती बाईला त्या बायकात जाउन चकाट्या पिटायला वेळ नव्हता तसेच ती त्यांच्या महिला मंडळाची मेंबर सुध्दा नव्हती. या सर्व कारणा मूळे बाकिच्या बायका तिला

“शिष्ट मेली” संबोधत होत्या.

या चर्चेत दामलीण बाई तर म्हणाल्या ” मी तर याना स्पष्टच सांगितले की आज मला वाणवसा करायचा करायचाय. सीताबाई सुध्दा आज येणार नाही तर तुम्ही आज बाहेरच जेवा. पोरानाही बजावून ठेवलंय जेवायला आज उशिर होईल. माझा वाणवसा झाल्यावर पोराना ब्रेड नि जाम खायला दिले. आणि ही मालतीबाई वाणवसा न करता स्वयंपाक करत बसली. सांगायचं एक दिवस नवऱ्याला जेवा बाहेर म्हणून. काय त्या म्हाताऱ्या सासूचे एव्हढे कौतूक करत बसते, तिला जेउ काय घालते, तिचे अंथरूण काय घालते, तिला औषधे काय देते!! ” अशी जोरदार चर्चा चालू होती. त्यात दोडके बाईने सागितले की सकाळी सकाळी सीताबाई आली आणि मला ५०० रुपये द्या म्हणू लागली. मी तिला स्पष्टच सांगितले की यानी मला पैसे ठेवलेत पण त्याच्या मला हळदी कुंकवाला लूटायला भारी डिश आणायच्यात म्हणून. इतरही साळकाया म्हाळकायानी सांगितले ” हो गं माझ्याकडेही मागत होती तोंड वेंगाडून सीताबाई पैसे. मी साफ सांगितले नाहीत माझ्याकडे म्हणून. ”

ठरल्या प्रमाणे संध्याकाळी सर्वांकडे हळदी कुंकू पार पडले. अत्तरे, स्प्रे यांची बरसात झाली. भारी भारी वस्तू लूटल्या गेल्या. साड्या, दागिने यांचे रसभरित वर्णन व कौतूक (वास्तविक तोंडावर कौतूक व माघारी नावे ठेवणे) झाले. संध्याकाळी सुध्दा मालती बाई कोणाकडेच हळदीकुंकवाला आली नाही म्हणून नावे ठेवली गेली.

दूसरे दिवशी सीताबाई कामाला आली म्हणून सर्वांचे जीव भांड्यात पडले. सर्वानी तिच्यावर सणादिवशी का दांडी मारलीस म्हणून तोंडसूख घेतले. तिने फक्त नवऱ्याची तब्येत बरी नव्हती एव्हढेच सांगितले. पण घोडके डॉक्टरिण बाईने विचारले सणाच्या दिवशी का दांडी मारलीस तेव्हा सीताबाई ऐवजी घोडके डॉक्टरांनीच उत्तर दिले, ” अगं तूला माहित नाही का, काल तिचा नवरा रामू अगदी मरता मरता वाचला. आपल्या शेजारच्या मालती बाई त्याला आपल्या दवाखान्यात घेउन आल्या होत्या. ” डॉक्टरांचे बोलणे ऐकून सीताबाईंचे डोळे भरून आले. सीताबाई म्हणाली ” खरच डॉक्टर साहेब म्हणतात ते अगदी ख्रं आहे काल माझा नवरा एकदम जास्तीच आजारी झाला. तापानी फणफणत होता. त्याच्या इलाजासाठी मी तुमच्या सगळ्यानकडे पैसे मागत होते. पण तुम्ही कुणीच मला पैसे दीले नाहित. पण आपल्या मालतीबाईनी मला पैसे दिले. नूसतेच पैसे दिले नाहित तर मी फारच घाबरलेली आणि गांगरलेली बघून त्या स्वत:च माझ्याबरोबर दवाखान्यात यायला तयार झाल्या. अगदी रिक्षा आणून दवाखान्यात ॲड्मिट करेपर्यंत त्यानी मदत केली. डॉक्टरसाहेब म्हणाले सुध्दा लवकर आणलेत म्हणून बरे झाले नाहितर आणखी गुंता (कोंप्लिकेशंस) वाढले असते. लवकर उपचार मिळाले म्हणून बरे झाले. मालती बाई सकाळी यायला तयार झाल्यावर मी म्हटलं सुध्दा की तुम्ही कसं काय येणार?  तुमचा अजून वाणवसा व्हायचाय. संध्याकाळी हळदी कुंकवाला बायका पण बोलावल्या असतील ना. तर मला म्हणाल्या, ” अगं वाणवसा म्हणजे आनखीन दूसरे वेगळं असं काय असतं?  एखादं वाण म्हणजेच दान द्यायचं असतं, दान द्यायचा वसा घ्यायचा असतो. म्हणजे दान करायचं असतं. मग जे दान द्यायचं ते सत्पात्री असावं. ज्याला द्यायचंय त्याला त्याची किती गरज आहे हे महत्वाचं आहे. ज्या सवाष्णी ला त्याची खरी गरज आहे तिला ते दान मिळणं गरजेचे आहे. भूकेलेल्याला अन्न देणं जितकं महत्वाचे आहे तितकेच गरजवंताला वेळेत मदत करणे हा फार मोठा वाणवसा आहे. पुर्वी गाडगी मडकी हिच संपत्ती होती त्यात बोरं, उस, हरभरा इत्यादी घालून त्याचं दान केलं जायचं. पण आत्ताच्या काळात गाडगी नि मडक्यांचा तसा काहिच उपयोग नाही. तरी सुध्दा बायका त्याचे स्तोम माजवतात. यात आपल्या संस्कृतिला नावे ठेवण्याचा अजिबात उद्देश नाही. कालमानानुसार त्यात जरूर ते बदल घड्वून आपली संस्कृती नक्कीच जपावी. ” त्यानी त्यांच्या नवऱ्याने दिलेले लूटायच्या वस्तू आणायचे पैसे मला दिले. डॉक्टरसाहेबानी सुध्दा मला खूप मदत केली.

हे ऐकल्यावर डॉक्टर म्हणाले ” खरंच मालती बाईंचे म्हणणे अगदी रास्त आहे. आज तुम्हा सर्वांच्या पेक्षा मालती बाईंचा खरा वाणवसा झाला असे मी म्हणेन. एका सवाष्णीच सौभाग्य वाचवण्यासाठी त्यानी जी मदत केली, जे प्रयत्न केले किंवा जी आर्थिक मदत केली तोच खरा वाणवसा. सीताबाईला मदत म्हणून त्या दिवसभर रामू पाशी थांबल्या, कुठेही हळदी कुंकवाला गेल्या नाहित. त्यांच्या मदतीमुळे रामूचे प्राण वाचलेत. त्या आधी नवऱ्याची बायको म्हणून, सासूची सून म्हणून, मुलांची आई म्हणून जी काय कर्तव्ये आहेत ती आधी पार पाडतात आणि मग देव धर्म, हळदी कुंकू, महिला मंडळ या गोष्टीना महत्व देतात. तुम्हा सर्वानी हल्लीच्या दिवसात त्यांच्यापासून हाच बोध घेतला पाहिजे. ”

एव्हाना महिला मंडळाच्या मिटींग साठी एकेक करून सर्व बायका डॉक्टरिण बाईंच्या घरी जमल्याच होत्यां त्या सर्वानी डॉक्टरांचे बोलणे ऐकले आणि त्याना ते खरोखरच पटले. सर्वानी मालती बाईना बोलावून आणले. त्याना हिणवल्या बद्दल त्यांची माफी मागितली.

सर्व जणीनी पुढच्या वर्षी पासून खऱ्या अर्थाने ” वाणवसा” करण्याचे नक्की केले.

लेखिका : सुश्री नीता र. कुलकर्णी

हैदराबाद.

प्रस्तुती : सौ अंजली दिलीप गोखले 

मोबाईल नंबर 8482939011

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ खिडकी… ☆ सुश्री स्वप्ना मुळे (मायी) ☆

सुश्री स्वप्ना मुळे (मायी)

? जीवनरंग ?

☆ खिडकी… ☆ सुश्री स्वप्ना मुळे (मायी)

रिक्षावाल्यानं बरोबर स्टेशनच्या दारासमोर रिक्षा उभी केली. त्याला हातात चुरगाळत घेतलेल्या नोटांपैकी एक नोट देत पळतच ती तिकीट खिडकीकडे पळाली. “आता कोणती ट्रेन उभी आहे…?”

तिचा प्रश्न ऐकून आपल्या नाकावरच्या चष्म्यातून बघत तो म्हणाला, “तासाभराच्या प्रवासाची… ह्या पुढचा ट्रेनचा लास्ट स्टॉप आहे. ”

“मला ना प्रवासाला जायचंय… मला द्या ह्याच ट्रेनचं तिकीट. ”

त्यानं हसत पिसीवर टायपिंग केलं… “मॅडम, हीच ट्रेन परतीची आहे तासाभरात. ते पण देऊ का…? ”

त्याच्या ह्या प्रश्नावर ती म्हणाली, “म्हणजे परत येऊच का? तिथून पुढं दूर निघून जाणारी ट्रेन असेल ना…! ”

तो हसला… “किती दूर जाता मॅडम… कुठंही जा, पळसाला पानं तीनच! ”

ती आणखीनच चिडली, “कुठंतरी सापडेल एका पानाचं पळस! ”

तो म्हणाला, “काय कामाचं ते एक पानाचं पळस! एखादा दिवस आवडेल तुम्हाला… परत वाटेल, नकोच… आपलं साधंच बरं नेहमीचं! ”

एवढं बोलत त्यानं तिकीट तिच्या हातात दिलं. म्हणाला, “खास विंडो सीट येता जाता… अशी खिडकी जी बाहेर डोकवता डोकवता आतही डोकवायला लावते… प्रवासातली खिडकी! ”

त्याच्या बोलण्यावर डोळ्याच्या कोपऱ्यातून रागाचा कटाक्ष टाकत ती पळाली. दादरा चढताना ती त्याच्याकडे आणि तो तिच्याकडे बघतच होता. त्यानं बदमाशपणानं अभिमान मधल्या अमिताभसारखं बोट ओठाजवळ नेत तिला डोळ्यानं खुणावलं, तशी ती चिडून हात उगारत पळाली.

हे सगळं बघणारा शेजारचा पाटणकर उठून त्याच्याजवळ आला. त्याच्या खांद्यावर हात थोपटत म्हणाला, “काय हो, ओळखीची आहे का? ”

हसत चष्मा नाकावर सरकवत तो म्हणाला, “शी इज मिसेस माने. ”

पाटणकर आ करून बघत राहिला… “अरे, तेच म्हणतो मी. तू त्यांना नाव न विचारता तिकीट दिलंस, तेव्हाच वाटलं, पण अरे त्या गेल्या कुठं? ”

“खिडकीला भेटायला…” असं माने म्हणताच पाटणकर ओरडला, “what…? काय म्हणालास…? खिडकीला भेटायला? म्हणजे काय?? ”

“चल कॉफी घेऊ आपण… ए जोशी, जरा काऊंटरवर लक्ष दे. आम्ही आलोच. तसंही आता तुम्ही तिघं आहात. ”

माने आणि पाटणकर कॉफी घेण्यासाठी आले. माने म्हणाले, “कसं आहे ना दोस्ता, आपण ह्या आयुष्याच्या प्रवासात पळत असतो. जे वाट्याला आलं, ते आपल्या परीनं रडत-कुढत, स्वीकारत, चिडत आयुष्य जगत असतो. खरंतर प्रत्येकाला गरज असते, रेल्वेची खिडकी पकडून मागं पळणाऱ्या झाडासोबत आपलं आयुष्य मागंही कसं होतं, हे कधीतरी बघण्याची… म्हणजे त्या खिडकीत बसून आपल्या मनाच्या आतल्या खिडकीत डोकावण्याची.

कधीतरी असं वाटलं, की हे असं करायचं… मग ती जरा रिलॅक्स होते. मुळात तिला आयुष्यानं फार त्रास दिलाय. तरीही मनाला सावरत ती आज इथपर्यंत आहे. मला साथ देते, मग मलाही तिला अशा प्रवासाला जाऊ द्यावं वाटतं…

म्हणजे, आम्हीच हा मार्ग शोधलाय आमच्या जगण्यात. कारण दुःखाची तीव्र किनार आहे आयुष्याला… मग त्यासाठी स्वतःला खंबीर करत राहायचं, डोकावायचं शांत होऊन आतल्या आत…” 

हे सगळं बोलताना मानेच्या डोळ्यात नकळत पाणी आलं. त्याने ते पुसण्यासाठी चष्मा काढला. रुमालानं डोळे पुसताना तो म्हणाला, “तुला माहितीये ना, हे माझं दुसरं लग्न… पहिल्या बायकोपासून मला मूल झालं पण ते मतिमंद जन्माला आलं आणि तिने चक्क मला घटस्फोट दिला. ‘असलं मूल, असलं आयुष्य मी जगूच शकत नाही’ म्हणत तिनं त्या मुलाला मारहाण करायला सुरुवात केली. शेवटी मी तिला मोकळं केलं… “आता फार मोठा प्रश्न माझ्या म्हाताऱ्या आई-वडिलांचा होता. तो मतिमंद नातू, घटस्फोटित मुलगा, सगळंच त्यांच्या इझी गोईंग आयुष्याच्या विरुद्ध होतं. त्यांना हे सगळं वेगळंच वाटू लागलं. त्यामुळं ताण घेऊन त्यांना आलेले अटॅक… त्यांची उतारवयात वेगळीच परीक्षा!

पहिल्यांदा मला जाणवलं, फक्त पैसा असून उपयोगाचा नाही… खंबीर साथ आवश्यक आहे जगण्यात! लग्नाच्या बाजारात आता माझ्याशी, माझ्या पैश्याशी, नोकरीशी लग्न करायला बरेच जण तयार होते… पण ह्या मतिमंद मुलाच्या बापाशी कोणाला लग्न करायचं नव्हतं. मला आता फक्त मला सुख देणारी बायको नाही, तर माझ्या आई-वडिलांची आणि माझ्या मुलाची आई होईल अशी जोडीदारीण हवी होती…

माझी ही अपेक्षा अवास्तव होती… पण मन कुठंतरी शोधत होतंच; कारण हे सगळं आयुष्य एकट्यानं जगण्याची हिम्मतच नव्हती माझ्यात!

मध्ये असाच माझ्या मावशीकडे कार्यक्रमाला गेलो होतो,.. तिथं ही भेटली. मनाने उगाच कौल दिला… हीच, जिला आपण शोधतोय! मावशीकडे पोळ्या करायला येत होती. सहज चौकशी केली, तर माझ्या पायाखालची जमीनच सरकली…

तिच्यावर रेप झाला होता! कॉलेजमधल्याच मुलांचं कृत्य… प्रेम म्हणत फसलेली ती, रेप झाला म्हणताच घरच्यांनी गदारोळ केला… लगेच जख्खड म्हाताऱ्यासोबत लग्न ठरवलं. तो पैसे देणार होता, म्हणून घरच्यांनी तिला विचारलं नाही. तिची आईच तिला म्हणाली, ‘रेप झाल्यावर आता दिवसही राहिलेत… कोण स्वीकारेल तुला? हे लग्न कर म्हणजे तू सुखी आणि आम्ही सुखी! ’

“आपली आईच असं म्हणतेय म्हटल्यावर पाठिंबा आता कुणी देणार नाही. तिनं निर्णय घेतला आणि ती घरातून पळाली. स्टेशन गाठलं… मिळेल त्या रेल्वेनं नव्या शहरात आली. रेल्वेच्या खिडकीत बसून आयुष्याच्या फ्लॅशबॅक परत उजळणी करून घेतला…

तिला आपल्या नात्यातले बरेच जण आठवले, जे लेकरू व्हावं म्हणून नवस, ट्रीटमेंट सगळं करतात… आणि आपल्याला का ही शिक्षा? खिडकीतून उदास होऊन ती सगळं आठवत होती… पण हीच खिडकी तिला नवं आकाश, नवे किनारे दाखवत होती. रेल्वेत आलेले अपंग, आंधळे तिला संघर्ष असून जगण्याची आस बाळगून कसं जगावं हे शिकवत होते…

तिनं ठरवलं, नव्या शहरात मोठ्या घरांसमोर पोळ्याची कामं मागितली. दिवसात वीस-तीस घरं फिरली, तेव्हा कुठं दोन कामं मिळाली… हळूहळू जम बसला. नंतर दहा घरच्या पोळ्या करते. शिवाय शिक्षण पूर्ण केलंय…”

माने पुढं म्हणाले, “मावशीच्या तोंडून हे सगळं ऐकल्यावर मी म्हणालो मावशीला हिम्मत करून, ‘माझ्यासोबत लग्न करशील का विचार तिला…’

माझ्या प्रश्नावर मावशीनं ‘आ’ केला… ‘अरे, जात पात माहीत नाही आणि रेप झालाय तिच्यावर हे ऐकलंयस ना तू,..? ’मी उदास हसत म्हणालो, ‘माझी पहिली बायको जातीतली, रेप न झालेली होती… पण पवित्र बंधातून जन्म दिलेल्या माझ्या मुलाला सांभाळलं नाही. हीनं वाईट कृत्यातून झालेलं मुल आईच्या मायेनं सांभाळलं ना! हिच्या मनाची खिडकी मजबूत आहे. मावशी, तू विचार तिला… मी तिच्या मुलीसह स्वीकारतो तिला…’

“मावशीनं विचारलं. ती भेटायचं म्हणाली. भेटीत एवढंच म्हणाली, ‘मी स्वीकारेन तुमच्या मुलाला… पण हा नवा संघर्ष मला एकटीला पेलवेल असं नाही. तुमची साथ लागेल…’

“मी चटकन म्हणालो, ‘माझी साथ तर असणारच! ’ ती हसून म्हणाली, ‘एक वेगळी साथ… आयुष्याच्या प्रवासात मला रेल्वेच्या खिडकीत बसून मनाच्या आतली खिडकी उघडता आली. आपल्या ह्या संसारात मी कधी उबगले तर मला आवडेल त्या खिडकीत बसून एक असा प्रवास करायला, जो परत मला माझ्यातली ‘मी’ शोधून देईल! ’

“तिच्या वाक्यावर मी म्हटलं, ‘आणि तू हे सगळं सोडून दूर कुठं निघून गेलीस तर…! ’ ती खळखळ हसत म्हणाली, ‘अहो नाही जाणार. मनाची खिडकी एक चौकट बाळगून असते आपल्या भोवती… ती असते जबाबदारीची! त्या जबाबदारीचा कधीतरी शीण आला की अश्या प्रवासाच्या खिडकीतून त्या चौकटीला बघायचं… मग ती आपल्याला तो निसर्ग दाखवते, जो सतत संघर्ष करत जगत असतो. ते अवकाश दाखवते, जे आपल्यावर आशीर्वादाची शिंपण करत असतं, फक्त गरज असते नवं होऊन त्या खिडकीत जाऊन डोकावण्याची. जबाबदाऱ्या टाळायच्या नसतात फक्त त्या स्वीकारायला आपली ताकद अश्या प्रवासानं वाढवायची असते. मला हा प्रवास कुठलंही कारण न विचारता तुम्ही करू देणार आहात का माने…? मग मी तयार आहे, तुमच्या आयुष्याच्या खिडकीत माझ्या लेकीसह येण्यासाठी. ’”

कॉफी संपली होती. मानेची लव्ह स्टोरीही संपली. पाटणकर आश्चर्यानं बघत होता… “असंही जगतात माणसं…? ”

त्याच्या प्रश्नावर हसत माने म्हणाले, “आम्ही तरी जगतोय… आता तूच विचार कर. स्वतःवर झालेला अत्याचार, त्यातून झालेलं लेकरू, त्यात माझं मतिमंद मूल, माझे आई-बाबा… हे सगळं ती आता समर्थपणे पेलते. अशीच कधीतरी चिडते, उबगते आणि मग तास-दोन तास सगळं सोडून निघून जाते आज गेली तशी…”

त्यावर पाटणकर म्हणाला, “मग घरी सगळे विचारात पडत असतील ना? ”

माने म्हणाले, “नाही! तिनं सगळ्यांना अश्या खिडक्या शोधायला शिकवलंय. माझा मुलगा चित्रात अश्या खिडक्या शोधत बसतो, मुलगी गाण्यात शोधते, आई बाबा घराच्याच खिडकीतून त्यांच्या विचारांची खिडकी शोधतात… आणि त्यांना सगळ्यांना हिची खिडकी माहितीये, त्यामुळं तेवढा वेळ सगळे ॲडजस्ट करतात…”

पाटणकर म्हणाला, “आणि माने, तुमची खिडकी…? ”

माने हसत म्हणाले, “अरे ही माझी बायकोच माझी खिडकी आहे! तिनं तिचं माझं नातं इतकं छान जोपासलंय की मला तिच्या डोळ्यात माझी खिडकी सापडते. अरे, तुटून गेलेली स्त्री जर एवढ्या ताकदीनं जगते, तर आपण काय…! ” असं म्हणत माने निघाले.

काही वेळात परतीच्या ट्रेननं मिसेस माने उतरल्या. खरंच दोघांचं बॉंडिंग जबरदस्त होतं. दोघांनी फक्त डोळ्यात बघितलं. त्यांनी हात पुढं केला, तिनं तो पकडला. तिकडे ट्रेन निघाली, इकडे ही जोडी निघाली.

पाटणकर मनोमन म्हणत राहिला, ‘मनाच्या खिडक्या योग्य मिळाल्या, की रेल्वेच्या सुखकर प्रवासासारखा आयुष्याचा प्रवास सुखकर होत असेल!’

© सुश्री स्वप्ना मुळे (मायी)

फक्त व्हाट्सअप संपर्क +91 93252 63233

छत्रपति संभाजी नगर महाराष्ट्र

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ तीन अनुवादित लघुकथा – मुक्ती / निवास / विवशता – मूळ हिन्दी लेखक : मोहम्मद जिलानी  ☆ भावानुवाद – सौ. उज्ज्वला केळकर ☆

सौ. उज्ज्वला केळकर

? जीवनरंग ?

☆ तीन अनुवादित लघुकथा – मुक्ती / निवास / विवशता – मूळ हिन्दी लेखक : मोहम्मद जिलानी  ☆ भावानुवाद – सौ. उज्ज्वला केळकर

१) मुक्ती –

‘बेटा, रात्र खूप झालीय. एवढ्या रात्री एकटाच कुठे चालला आहेस? ‘ आईच्या या प्रश्नावर सी. आय. डी. इन्स्पेक्टर कमल म्हणाले, ‘आई, कॉल आलाय. कुणी तरी अडचणीत असेल. आम्हा पोलिसांचे कामच आहे, अडचणीत सापडलेल्यांना मदत करायची. तू काळजी करू नकोस. मी लवकरच परत येईन. ‘ असं म्हणून जीपमधून कमल नॅशनल हाय वे कडे जाऊ लागले. सगळीकडे गडद अंधार होता. तासभर तरी ते गाडी चालवत होते. इतक्यात उजवीकडे एक शुभ्र साडीतील मुलगी त्यांना थांबण्याचा इशारा करताना दिसली. कमल काहीसे घाबरले. पण तिकडे दुर्लक्ष करत पुढे निघाले. एवढ्यात त्यांची जीप अचानक थांबली. ब्रेक लावून ते जीपमधून उतरले आणि सगळीकडे पाहू लागले. पण त्यांना काहीच दिसलं नाही. जीपमध्ये बसून ते पुन्हा गाडी चालवू लागले. थोडं दूर गेल्यावर त्यांना जाणवू लागलं की गाडीत कुणी तरी आहे. बॅक व्ह्यू मिरर मधे बघितल्यावर ते गर्भगळीत झाले. त्यांनी एकदम जीप थांबवली आणि घबरत घाबरत विचारलं,

‘कोण आहेस तू? आत कशी आलीस? ’

आत बसलेल्या मुलीने म्हंटले, ‘‘घाबरू नका. फोन मीच केला होता. ’

‘माझ्याकडे काय काम होतं?

‘मला जो माझी मदत करेल, अशा तुमच्यासारख्या कर्तव्यनिष्ठ पोलीस ऑफीसरचीच गरज होती. अनेक दिवसांच्या प्रतिक्षेनंतर तुम्ही मिळालात. ’

‘तुझं काम तरी काय आहे?

‘इथून डावीकडे एक की. मी. अंतरावर एक तळं आहे. त्याच्याजवळ वडाचा विशाल वृक्ष आहे. ’

‘या बाबत मी काय करू शकतो? ‘

‘तुम्हाला माझ्याबरोबर तिथे यावं लागेल! ’

इच्छा नसतानाही कमल आपला मोठा टॉर्च घेऊन त्या मुलीच्या मागोमाग चालू लागले.

वडाच्या वृक्षाच्या जवळ थांबून तिने आपल्या बोटाचा इशारा ज्या जागी केला, ती जागा पाहून कमलना घामच फुटला. त्यांची बोलतीच बंद झाली.

मुलगी म्हणाली, ‘घाबरू नका. ती माझी समाधी आहे. ‘

‘म्हणजे तू… ? ’

‘. हो. त्या शरिराचा मी आत्मा आहे. माझं नाव माया होतं. माझा प्रियकर चंदरने वर्षापूर्वी मला फसवून इथे आणलं. माझ्यावर आपल्या दोन मित्रांसामवेत बलात्कार केला. मग मला मारून टाकलं आणि या इथे मला पुरलं आणि ते पळून गेले. ’

कमलने सावकाश विचारलं, ‘तुला काय हवय? ’

 ‘मला मुक्ती आणि त्यांना शिक्षा’

 ‘पण याला पुरावा काय? ’

‘ओढाताणीत चंदरचं लॉकेट माझ्या हातात आलं होतं. ते अजूनही माझ्या उजव्या हातात सुरक्षित आहे. ’

सकाळ व्हायला आली होती. इन्स्पेक्टर कमलने पोलिसांच्या मदतीने समाधी उघडली. आपल्या टीमच्या माध्यमातून आणि मायाच्या शवाच्या हातातील लॉकेटच्या पुराव्यावरून चंदर आणि त्याच्या दोघा मित्रांना ताब्यात घेतले. न्यायालयात, अपहरण, बलात्कार आणि खून या आरोपाखाली खटला चालवला गेला. तिघांनाही फाशीची शिक्षा होणार, हे जवळ जवळ निश्चित झालं.

न्यायालयातून बाहेर पडताना कमलला दूर झाडाखाली माया उभी असलेली दिसली. ते तिच्याकडे गेले. ‘मी आपली आभारी आहे. आपण मला मुक्ती दिलीत. ’ ती म्हणाली आणि ती गुप्त झाली.

तिथून निघताना कमलच्या मनात आलं, ‘कायदा काय केवळ जीवित लोकांसाठीच असतो?

मूळ कथा – मुक्ति

मूळ लेखक – महम्मद जिलानी मो. 9850362698

मराठी अनुवाद – उज्ज्वला केळकर मो- 8369252454

२) निवास – – 

‘ए, चल, निघ इथून! कब्रस्तानच्या चौकीदाराने झोपलेल्याल्या भिकाऱ्याला फटकारत म्हंटलं.

भिकारी शमशु उठत म्हणाला, ‘भय्ये, फक्त रात्रभरच झोपतो. कुणाला काय त्रास आहे? ‘

‘अरे बाबा, समजत कसं नाही तुला? हे कबरस्तान आहे. नातेवाईक विरोध करतात. ’

‘यात विरोध करण्यासारखं काय आहे? ‘

‘त्यांनाही मन:शांती, समाधान हवे असते. शिवाय अलीकडे जादूटोणा करणारे मांत्रिक मुडदे उकरून गायब करतात. मी तुला किती वेळा समजावलं. पण तू ऐकतच नाहीस. ‘ असं म्हणत त्याने बरोबर आलेल्या पोलिसांच्या हवाली त्याला केले.

पोलीस ठाण्यावरील इन्स्पेक्टरने कडक स्वरात विचारले, ‘ का रे, मुडदे चोरतोस काय? ”

शमशु घाबरत म्हणाला, ‘हुजूर, तसलं काही करत नाही मी! नाईलाजाने मी फक्त तिथे झोपतो! ‘

‘आता असलं काही चालणार नाही. तू दुसरी जागा शोध. ’

‘हुजूर, कुठे शोधू? मंदिर किंवा मशिदीजवळ झोपलो, तर हाकलून देतात. धार्मिक किंवा सरकारी संस्थानच्या आसपासही फिरकू देत नाहीत. फुटपाथवर झोपलं, तर कोणी पियक्कड गाडीवाला, गाडीने चिरडून टाकेल, याचा नेम नाही. जगलो, वाचलो, तर लंगडा, लुळा बनून आयुष्य काढायला हवं. ’ 

‘यात पोलीस काय करू शकणार? ‘

‘ कमीत कमी आम्हाला कब्रस्तानमध्ये तरी झोपू द्या. तिथे भीतीच्या ऐवजी शांती तरी आहे. ‘

हे ऐकून स्तब्ध झालेला पोलीस अधिकारी गांधीजींच्या फोटोकडे पाहू लागला.

मूळ हिंदी कथा – आशियाना

मूळ कथा – मोहम्मद जिलानी मो. ९८५०३६२६०८

अनुवाद – उज्ज्वला केळकर मो. – 8369252454 

३) विवशता – – 

‘माय लॉर्ड, आपण याच्या भोळ्या, भाबड्या चेहऱ्यावर जाऊ नका. त्याचे पाशवी कृत्य बघा. एका निरागस मुलीची हत्या करताना त्याला ‘रंगे हात ‘ पकडलय. ‘ असं म्हणत सरकारी वकील कुमारसेन यांनी आपला युक्तिवाद मांडला. ही अनोखी केस ऐकण्यासाठी, बघण्यासाठी फास्ट ट्रॅक कोर्टात खूप गर्दी लोटली होती. पुढील कारवाई करत कुमारसेनने पोलीस पाटील राणे यांना साक्षीदाराच्या पिंजऱ्यात बोलावले.

‘आपण काय पाहिलत? ‘

काही दिवसांपूर्वीची गोष्ट. तेव्हा मी गस्तीवर होतो. रात्री जवळजवळ दोन वाजता सुदामा गल्लीच्या कोपऱ्यावर असलेल्या विहिरीजवळ मी याला एका सहा-सात वर्षाच्या मुलीबरोबर पाहिलं.

‘मग काय झालं? ‘ 

‘ जवळ जाऊन पाहिलं, तेव्हा लक्षात आलं, की या माणसाने त्या मुलीचे हात-पाय-तोंड बांधून टाकलय. हा काय करणार आहे, याचा अंदाज आला नाही. त्यामुळे मी याला व त्या मुलीला घेऊन पोलीस ठाण्यात आलो. मुलीला ताबडतोब इस्पितळात पाठवण्यात आले. हा माणूस मात्र काहीच बोलला नाही. ’ 

‘त्याने काहीचं सांगितलं नाही? ‘ सरकारी वकिलांनी विचारलं.

‘ जी नाही. तेव्हापासून आत्तापर्यंत त्याने आपलं तोंड उघडलं नाही. ‘

‘माय लॉर्ड, ही केस अगदी स्वच्छपणे समोर येतेय. त्याचं मौन हाच त्याच्या गुन्ह्याचा पुरावा आहे. अपहरण, बलात्कार आणि हत्येचा प्रयत्न याची केस आहे ही! बी. एन. एस. धारा ६३, १०९ व १३७ च्या अंतर्गत याला शिक्षा व्हायला हवी. ‘

तुला आपली सफाई देण्यासाठी काही बोलायचंय? ‘ न्यायाधीश मॅडमने विचारले.

‘होय जज्जसाहेब. मला फाशी द्या. मी अपराधी आहे. माझा गुन्हा हा आहे, की मी गरीब आहे. ‘

‘तुला काय म्हणायचं आहे? ‘ 

‘माझे नाव गिरिधर आहे. शेजारच्या गोगुल गावातला, मी कमी शिकलेला आदिवासी शेतकरी आहे. पत्नीच्या जीवघेण्या आजारात माझी सगळी शिल्लक मिळकत संपून गेली. माझी ५ एकर जमीन सावकाराकडे गहाण ठेवून मी कर्ज घेतले आणि पत्नीवर उपचार करण्यासाठी शहरात आलो. नंतर कळलं, याने कोऱ्या कागदावर माझा अंगठा उठवून घेतलाय. ‘

‘पण यामुळे काही तू केलेला गुन्हा माफ होणार नाही. या मुलीचं अपहरण का केलंस? ‘ सरकारी वकिलाने विचारलं.

‘कोणीही बाप आपल्याच मुलीचे अपहरण, बलात्कार आणि हत्या का करेल? ‘

‘मग तू विहिरीजवळ का गेला होतास? ‘

सरकारी इस्पितळात इलाजाच्या दरम्यान माझ्या पत्नीचं निधन झालं. काही दिवस होते तेवढ्या पैशातून गुजराण केली. ’ 

‘या मुलीचं काय करणार होतास? ‘

‘ तहान-भूक सहन करत धर्मशाळेच्या परिसरात किती दिवस राहाणार? मग आत्महत्येचा विचार मनात आला. वाटलं, या क्रूर जनावरांच्या जगात माझ्यानंतर हिला एकटीला जगायला ठेवायला नको. वाटलं, विहिरीत उडी मारून दोघांनीही एकदमच मरून जावं. मुलगी ओरडू नये, पळून जाऊ नये, म्हणून तिचे हात-पाय आणि तोंड बांधून ठेवलं. ‘

हे ऐकून कोर्टात शांतता पसरली. सगळे निकालाची वाट पहात होते. न्यायाधीश आपला निकाल देताना म्हणाले, ‘ अज्ञान, गरिबी, लाचारी, विवशता यामुळे गिरिधरने हा गुन्हा करण्याचा प्रयत्न केला. कायद्याप्रमाणे जी शिक्षा असेल, ती याला होईल. पण कोर्ट सरकारला आदेश देत आहे, की सावकाराकडून गिरिधरची जमीन परत घेऊन त्याला पुन्हा जगण्याची संधी दिली जावी. त्याचे पुनर्वसन केले जावे.

टाळ्यांच्या कडकडाटात कोर्टाची कारवाई संपली…

मूळ कथा – मजबूरी

मूळ लेखक – मोहम्मद जिलानी मो. ९८५०३६२६०८ 

 मो: 8512070086

मराठी भावानुवाद : सौ. उज्ज्वला केळकर 

संपर्क – निलगिरी, सी-५ , बिल्डिंग नं २९, ०-३  सेक्टर – ५, सी. बी. डी. –  नवी मुंबई , पिन – ४००६१४ महाराष्ट्र

मो. 836 925 2454, email-id – kelkar1234@gmail.com 

≈संपादक –  श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ चॉकलेटचा बंगला ☆ सौ राधिका भांडारकर ☆

सौ राधिका भांडारकर

?  जीवनरंग ?

☆ चॉकलेटचा बंगला ☆ सौ राधिका भांडारकर

ही आहे गणूच्या चॉकलेटच्या बंगल्याची गोष्ट.

एकदा काय झालं! तारीख होती १४नोव्हेंबर. बालदिन. इनरव्हील क्लबच्या काही महिला नटून थटून धारावीच्या झोपडपट्टीत सकाळीच आल्या. मुलांना खाऊ वाटण्यासाठी. “बालदिन म्हणजे काय? तो का आणि कुणाच्या आठवणीसाठी साजरा केला जातो हे मुलांना सांगण्यासाठी, ”

तसे काही ना काही कारणाने कुणी ना कुणी या झोपडपट्टीत येतच असतात. कपडे, खाऊ, पांघरूणं, धान्य वगैरे घेऊन.

त्या बायकांना पाहून दारादारातून सुख्या, मुख्या, रामू, हसन, सलीम आणि लहानगा गणूही धावत बाहेर आले. अगदी उड्या मारत. खाऊ मिळणार होता ना?

गणू लहान असला तरी मनातल्या मनात तो स्वतःशीच बोलायचा. त्या छान छान साड्या नेसलेल्या, रंगीत कपड्यातल्या, चेहऱ्यावर पावडर लावलेल्या, हसऱ्या बायकांना पाहून गणू मनातच म्हणाला, ” माझी माय कधीच का अशी दिसत नाही? ”

सलीमच्या झोपडीसमोर एक पिंपळाचं झाड होतं. तिथल्याच थोड्या मोकळ्या जागेवर त्या सुंदर बायकांनी मुलांना एकत्र यायला सांगितले आणि बॅगेतून आणलेला खूप सारा खाऊ सगळ्या मुलांना वाटला. मुलांनी नेहमीप्रमाणे गलका केलाच. ” मला द्या मला द्या की” मातकट, न धुतलेले हात पुढे करून. नेहमीप्रमाणेच. गणू मात्र दूर उभा राहून ही सारी गंमत पाहतच होता. खाऊ तर त्याला हवाच होता पण त्याने हात मात्र पुढे केला नाही. एक छान ताई मग स्वतःहून त्याच्या जवळ आली आणि मूठभर चॉकलेट्स तिने त्याच्या चिमुकल्या दोन हातात अगदी प्रेमाने ठेवली. गणूला खूपच आनंद झाला. ती ताई म्हणाली, ” खाऊन टाक सारीच्या सारी पण नंतर मात्र दात घासशील ना? ” गणू ने मोठे डोळे करून ताईकडे पाहिलं आणि म्हणाला या चॉकलेटचा मी एक बंगला बांधू का?

गणूने कधीतरी मुख्याच्या रेडिओवर, चॉकलेटच्या बंगल्यावरचं गाणं ऐकलं होतं आणि त्याला ते फार आवडलं होतं.

ताईला खूपच हसू आले. तिने गणूच्या डोक्यावर टपली मारली आणि म्हणाली, बांध की. मी तुला अजून खूप सारी चॉकलेट्स आणून देईन.

त्यानंतर ताईने तिच्या इतर मैत्रिणींना काहीतरी गुपचूप सांगितले आणि ती मुलांना म्हणाली, ” चला रे मुलांनो! हातात हात धरून रिंगण करा बरं! आपण किनई आता एका गाण्यावर नाच करूया. ”

“येरे तू पण ये. नाव नाव काय रे तुझं? ” “गणू. ”

“हे बघ तू रिंगणाच्या मध्यभागी उभा रहा. ही टोपी घाल आणि हे बघ काय आहे. याला मास्क म्हणतात. तोंडावर चढव. ताईने सगळ्यांनाच वेगवेगळे मास्क घालायला दिले. मांजराचे, वाघाचे, कुत्र्याचे, माकडाचे. आणि सगळेजण ताई म्हणत असलेल्या गाण्यावर मस्त नाचू लागले. आता ती धारावीची चिखलातली, उघड्या गटारातली, फाटक्या कपड्यातली झोपडपट्टी नव्हतीच. ती होती एक वेगळीच रंगीबेरंगी नगरी. “असावा सुंदर चॉकलेटचा बंगला

चंदेरी सोनेरी चमचमता चांगला”

गणूला इतका आनंद कधीच वाटला नव्हता. घरात कुणीच नव्हतं. उखडलेल्या फरशीच्या, पत्र्याच्या घरातल्या त्या खडबडीत उंबरठ्यावर तो एकटाच बसला होता. बाकीची मुलं फुटके टायर घेउन गाडा गाडा खेळत होती. काही जवळच साचलेल्या पाण्यात कूदत होती.

माय आणि बापूस दिवसभर घरात नसतात. कधी संध्याकाळी तर कधी रात्रीच घरी येतात. माय त्याच्यासाठी कधी कधी कागदाच्या पुडीत दाणे, भजी, शेव, आणते. बापूसला सारे दारुड्या, बेवडा म्हणतात आणि तो मायला रोज मारतो.

उंबरठ्यावर बसलेल्या गणूला खरंतर हे काहीच आवडत नाही पण आज मात्र तो खूप आनंदात होता. स्वतःशीच हसत होता. “असावा सुंदर चॉकलेटचा बंगला. ”त्यातच तो पार हरखून गेला. एका वेगळ्याच दुनियेत गेला. तेवढ्यात डोक्यावर मुकुट घातलेली आणि हातात चांदण्या चांदण्या असलेली एक सुंदर काठी घेऊन एक परी गणूजवळ अलगद हवेतूनच उतरली. गणूला वाटले ही ती ताईच. मुकुट घातलेली, परीसारखी दिसणारी. किती सुंदर! परीने हातातली काठी आपटली आणि काय आश्चर्य तिथे आता धारावीची झोपडपट्टी शिल्लक नव्हती तिथे होता एक सुरेख भलामोठा चॉकलेटचा बंगला. त्याला दारं होती, खिडक्या होत्या. बंगल्याच्या भोवती हिरवीगार झाडं होती, निळ्या रंगाचं सभोवताली पाणी होतं, झाडांवर रंगीबेरंगी पक्षी गणूसाठी गाणी गात होती. फुलपाखरे होती. तिथे गटारांची दुर्गंधी नव्हती. चॉकलेटच्या बंगल्यातून पेपरमीटचा सुगंध घेऊन मस्त वारे वाहत होते.

अबब! केवढा मोठा हा सुंदर चॉकलेटचा बंगला! परीताईचा हात धरून तो या खोलीतून त्या खोलीत नुसता उड्या मारत होता. कुठे कुठे नळही होते आणि त्यातून खीर, बासुंदी सारखे गोड गोड पदार्थ वाहत होते. एक नळ उघडला तर त्यातून कितीतरी सोन्याची नाणीज नाणी वाहिली. चॉकलेटचा पलंग आणि चॉकलेटचे पांघरूण. चॉकलेटची तोरणं, चॉकलेटचे खांब. सोनेरी कागद चिकटवलेल्या चमचमणाऱ्या भिंती. परीताई म्हणाली, ” याला पाहिलंस? याला म्हणतात रोबोट. याचं नाव जीनी. तुला हवं ते माग याच्याकडे. तो तुला जे हवं ते देईलच.

गणूला कळेच ना काय मागावे? खरंतर त्याची यादी खूपच मोठी होती आणि त्याला सगळं हवं होतं. शिवाय या चॉकलेटच्या बंगल्यात वेगळीच माणसं होती. ती सारी हसत होती, खेळत होती, गाणी म्हणत होती. छान शब्दात बोलत होती. तिथे मारामाऱ्या नव्हत्या. भांडण नव्हती. ठिकठिकाणी ठेवलेल्या पेट्यांमधून सोन्याचे, चांदीचे दागिने होते. छान स्वच्छ कपडे होते आणि खुळखुळ आवाज करणारे पैसे होते. एका लांबोळक्या खोलीत शाळापण भरली होती. शाळेतल्या मुलांनी एकसारखे स्वच्छ कपडे घातलेले होते. फळा होता आणि मिशीवाले, घारे डोळेवाले गुरुजी मुलांना शिकवत होते. ते मुलांना सांगत होते, ” जो जे वांछील तो ते लाहो!” गणूला काही त्याचा अर्थ कळला नाही पण त्याला ती शाळा मात्र खूपच आवडली. गणूला वाटले जिनीला सांगावे असाच अगदी असाच “चॉकलेटचा बंगला” मला दे. आणि अशीच हसणारी माणसेही दे. ”

समोर एकदम खूप सारा पांढरा धूर झाला. नंतर एवढासा जिनी त्या धुरातून खोलीभर पसरला. त्याचे डोकंही छताला टेकलं आणि तो केवढ्या मोठ्याने हसला. त्याचा हाताचा पंजा म्हणजे जणू काही पृथ्वीचा गोलच होता आणि त्या गोलावर होता गणूला हवा असणारा चॉकलेटचा बंगला. त्यावर मोठ्या अक्षरात काहीतरी लिहिलं होतं ते काही गणूला वाचता आलं नाही पण त्यावर डोक्यात मोरपीस घातलेल्या, बासरी वाल्या कृष्णाचं चित्र होतं. गणूने नीट निरखून पाहिलं आणि त्याच्या डोळ्यात आनंदाची लाटच फेसाळली. तो कृष्ण नव्हता काही तो तर कृष्णा सारखा दिसणारा गणूच होता जिनी म्हणाला, ” हा तुझा चॉकलेटचा बंगला. बंगल्याचं नाव *फेरो रोशर* बरं का आणि त्यावर ही डार्क *चॉकलेटची कडेला आयसिंग केलेली वेलबुट्टी असलेली तुझ्या नावाची सुंदर पाटी. वाच बघू. त्यावर लिहिलंय, ” गणूचा बंगला” नंतर गणू, जिनी आणि परीताईबरोबर बरोबर नाच नाच नाचला. आकाशात झुमकन उडाला. केवढ्या तरी मोठ्या बोटीतून आकाशगंगेतही फिरला. फुलांशी, पाखरांशी, चांदण्याशी गप्पा केल्या. नंतर “जिनी” नाहीसा झाला, आंतर्धान पावला. परीताई ही कुठेतरी लुप्त झाली.

एका सुंदर जगात फिरून आलेल्या गणूला जेव्हा जाग आली तेव्हा तो त्याच्या घराच्या ओबडधोबड उंबरठ्यावर होता पण त्याला आतून असं वाटत होतं की तो खूपच आनंदात आहे.

“अरे! ओ गणू इथं काय करतोयस? काय खाल्लास पिल्लास की नाय? भगुण्यात भाकर नि पेज ठेवली हुती म्या. ”

माय कधी आली?

तेवढ्यात बापूसही आला. आज तो दोन पायावर न झुलता उभा होता हे विशेष. मायला म्हणाला, “अगं ओ माय आता ही झोपडपट्टी पाडणार म्हनत्यात. कुणी अमीर लय मोठा माणूस इथं लय भारी माल बांधणार आहे म्हनत्यात. ” “आता ग बया! मग आपन कुटं जानार व्हय. ”

“कळलच ते. आत्तापोतर इतलंच. ”

गणूनं या दोघांचं बोलणं ऐकलं आणि तो लगेच म्हणाला, ” माय काय बी काळजी नगं करूस. ‘जीनीने’ मला लय भारी चॉकलेटचा बंगला दिलाय. त्यात जाऊन आपण राहू की. ”

गणूच्या मायचा आणि बापूसचा ‘अॉ’च झाला आणि दोघेही एकदमच म्हणाले, ”यडं की खुळं गं हे? ” 

पण गणू ने मात्र मनाशी पक्क ठरवलं होतं, ”एक ना एक दिवस जिनीने दिलेल्या चॉकलेटच्या बंगल्यात आपण राहायला जायचंच. ”

गणूचे हे स्वप्न खरंच ठरो!

आधी पहावं मोठं स्वप्न आणि ते पूर्ण करण्यासाठी आयुष्यभर खूप धडपडावं “प्रयत्ने वाळूचे कण रगडिता तेलही गळे. ”

न जाणो! एक दिवस गणूच्या मनातला हा “चॉकलेटचा बंगला” प्रत्यक्ष पहायला अनेक प्रवासी नक्की येतील. बेल्जियममधल्या मुतणाऱ्या मुलाला- गणू इतकाच असेल तो नाही का? – जगभरातले प्रवासी बघायला येतात! इथे काहीही अतर्क्य नाही, अशक्य नाही. त्यातलाच हा गणूच्या स्वप्नातला चॉकलेटचा बंगला.

द्या टाळी.

© सौ. राधिका भांडारकर

पुणे

मो.९४२१५२३६६९

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares